ब्रिटिश डॉक्टर फ्रँक रायन यांनी आपल्या,
( Ryan 2002, Page 16 ) 'डार्विन्स ब्लाइंड स्पॉट'या पुस्तकात जीवसृष्टीत 'सिंबायोटिक' म्हणजेच सहजीवी नातेसंबंध असतात.या अनुषंगाने उदाहरण दिले आहे.गोबी मासा आणि एक प्रकारचा शिंपला एकमेकांच्या सहाय्याने राहतात. शिंपला अन्न मिळवतो,तर गोबी मासा संरक्षण पुरवतो.'हर्मिट' खेकड्याची एक प्रजाती एका गुलाबी ॲनेमोन प्राण्याला स्वतःच्या कवचावर राहू देते.मोठे मासे ऑक्टोपस हर्मिट खेकड्याला खाऊ पाहतात,तेव्हा ॲनेमोन हा प्राणी आपले चमकदार रंगीत तंतू फिस्कारून त्यातील विष त्या शत्रूंवर उधळतो,त्यामुळेच त्या भक्षक प्राण्यांना हर्मिट खेकड्याचा नाद सोडून पळ काढावा लागतो,हे सर्वज्ञात आहे. या विलक्षण सुरक्षेबद्दल ॲनेमोनला खेकड्याने खाऊन उरलेले अन्न मिळते.जे त्याला पुरेसे असते.
'द बायोलॉजी ऑफ बिलीफ'
हे पुस्तक समजून घेवून हातातून बाजूला ठेवले...!
आणखी परत सुरु झाला अंगावर रोमांच उभा करणारा नवीन जीवन सत्य समजून सांगणारा पुस्तकातील मोकळ्या दोन ओळींतील प्रवास..
सहजच व्हाट्सअप स्टेटस बघत असताना.आमचे मार्गदर्शक मित्र आदरणीय शितल खाडे साहेब व प्रभावी लेखक डॉ.रवींद्र श्रावस्ती यांचे छायाचित्र पाहिले.त्यामध्ये डॉक्टर साहेब खाडे सरांना 'शोध संत रविदास' यांचा ग्रंथ भेट देत आहेत.यासोबतच ग्रंथाचे मलपृष्ठ व मुखपुष्ट यांचा फोटोही पाठवला होता. मी मलपृष्ठ वाचले डॉक्टर व तत्वज्ञान हा विषय मला फारच वेगळा वाटला.मी फोन करुन ग्रंथ मागवून घेतला.लेखकांनीही तो त्वरित पाठवून दिला.
पान उघडले कृतज्ञतेच्या सुगंधकोशी वाचत असताना.
लेखकांचा नम्रपणा,लवचिकता विनयशीलता जाणवली.
जे तुम्ही शोधत असता ते देखील तुमच्या शोधात असते.
बा रविदासा ! शोध चालू आहे.! या प्रकरणांमध्ये या ग्रंथ निर्मिती मागील कळवळा उत्कंठा ध्यास कष्ट समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो ही संवेदनशील उच्च भावना लेखकांच्या मोकळ्या मनाचे दर्शन घडवते.
गुरू रविदास,संत रविदास,संत रैदास,संत रायदास व संत रोहितास ही संत रैदासांचीच नावे आहेत.संत रैदास हे निष्ठूर व्यवस्थेविरुद्ध सभ्य,शालीन शब्दात अभिव्यक्त होतात त्यांच्या या व्यक्त होण्याची तुलना फक्त फुलांच्या कोमलतेशीच करता येईल ! रैदासांनी घाव घातलेत पण रक्त वाहत नाही की जखम होत नाही ! रैदासांच्या विचारांची फुले ही साधीसुधी फुले नाहीत,ती अग्निफुले आहेत ! असे रजनीश ओशो म्हणतात.
रैदास पोकळीतून निर्मान होत नसतात! समाजव्यवस्थेत धग असते,आग असते,अन्याय असतो,अत्याचार असतो,त्यातून विद्रोह भडकून रैदात तयार होतात!
रैदासांची वाणी ही अशी वाणी कि ज्यात धग आहे पण ती आग लावणारी नाही,त्यात आग आहे पण ती प्रकाश देणारी आहे.गारठलेल्या मनाला उब देणारी ती आग आहे.ती आग आणणारी आग आहे! ती समाजमन जागविणारी आग होती! ती सर्जनशील आग होती. नव निर्माण करणारी ती आग होती. आगीचे हे प्रकार वाचून मी थक्क झालो.
चरित्रनायक रैदासांचे चरित्र गायब आहे.तसं ते संत कबीर व इतर संतांच्या बाबतीतही आहे.वैष्णवांचा प्रसिद्ध ग्रंथ 'राम पटल' या ग्रंथात रामानंद संप्रदायातील तेहतीस ( डॉ. सूरजमल यांच्यामते ५२ ) संतांचा उल्लेख केला गेला आहे. त्यात कबीर, पीपा,नामदेव यांच्या नावाचा उल्लेख आहे पण संत रैदासांचा नाही.हेही एक कोडेच आहे. पण त्याच बरोबर हेही आश्चर्यकारक आहे की कबीर,
त्रिलोचन,सधना,सेन,पीपा,पलटूवास,धर्मदाय यांनी कुणीही आपल्या रचनांमध्ये स्वामी रामानंद यांचा गुरु म्हणून निर्देश केलेला नाही
त्यांच्या पत्नीचे नाव लोनी होते.एकुलता एक विजयदास नावाचा पुत्र होता.त्यांच्या मृत्यूचे कोडेच आहे.त्यांच्या अंतिम समयी ते काशी म्हणजे वाराणसीमध्ये राहत होते,असे काही अभ्यासक मांडतात.तर काही अभ्यासक चितोड गडावर त्यांना कपटाने मारले गेले,असे प्रतिपादन करतात.ते १२० वर्षापेक्षा जास्त जगले असेही मानले जाते.
रविदास वाणीचे सर्वात जुने व प्रामाणिक संकलन शिखांच्या 'आदिग्रंथा'त आहे.गुरु अर्जुन देव यांनी इ.स.१६०४ मध्ये 'आदिग्रंथा' चे संकलन केलं.रविदास यांच्या मृत्यूनंतर जवळजवळ शतकाने हे संकलन केले आहे, ही गोष्ट नमूद केली पाहिजे.
आदिग्रंथा' मध्ये त्यांची ३९ पदे व १ साखी यांचा समावेश केला गेला आहे.त्यात एकच पद दोन वेळा किरकोळ फरक करून संकलित केलं आहे.त्यामुळे त्याला धरून ४० पदे व एक साखी त्यात आढळते.
आख्यायिका आणि गुरू रविदास प्रकरणांमध्ये जगभर Mythology म्हणजे दंतकथा, आख्यायिका किंवा पौराणिक कथा यांचा अभ्यास केला जातो.
इंग्रजी वंशशास्त्रज्ञ बी.मिलीनोव्हस्की या मिथक कथा विषय मत मांडताना म्हणतात,'पौरानिक कथा (ही) विचारांचे कोडिकीक्षण करते,नैतिकतेला बळकट करते,वर्तनाचे काही नियम आणि मंजूर विधी प्रस्तावित करते,सामाजिक संस्थांना तर्कसंगत ठरवते आणि न्याय ठरवते.पौरानिक कथा संपूर्ण मानवी इतिहासाला,विचार विश्वाला कवेत घेऊ शकत नाही या संदर्भात खूपच प्रभावी अभ्यासपूर्ण मांडणी केलेली आहे.
हे वाचत असताना मला मनापासून वाटत होते.हा ग्रंथ माझ्यासाठी 'मी जिथे आहे तिथून मला जिथे जायचे आहे तिथे कसे पोचावे हे सांगत आहे.'
एकदा संत रविदास चितोडच्या महाला जवळील एका कच्च्या रस्त्याने जात असताना त्यांना उन्हामुळे भरपूर तहान लागली.तिथेच काही महिला पाणी भरत होत्या.त्या महिलांमध्ये चितोडची कुलवधू राजकुमारी मीरा पण रविदास म्हणाले,'मुली,थोडे पाणी पाज,तुझे कल्याण होईल!'मीराने लगेच त्यांना प्रेमभराने पाणी पाजले आणि त्यांचा परिचय विचारला.संत रविदास यांनी माहिती दिली,'मी काशी चा रहिवासी असून माझे नाव संत रैदास आहे.माझी जात चमार आहे.मीराने पण आपली ओळख करून दिली,म्हणाली,'स्वामीजी मिराबाई! माझ्या जीवनामध्ये दुःख आणि दुःखच आहे.त्यामुळेच माझे जीवन नरकासमान झाले आहे! कृपया मला आपली शिष्या बनवून मला या दुःखातून मुक्त करा,स्वामी!'
संत रविदास यांनी दयापूर्ण अंतकरणाने तिची प्रार्थना ऐकली आणि तिला आपली शिष्या म्हणून स्वीकारले.
(संदर्भ - रविदास - रामायन - लोककथा )
शब्दकोशात 'संत' या शब्दाचा अर्थ साधू,विरक्त, किंवा त्यागीपुरुष असा सर्वसाधारणपणे सांगितला जातो.
सत्याचे आचरण करणारा,आत्मज्ञानी (सत्यज्ञानी) असा अर्थ त्याच्या 'सत' शब्दावरून सांगितला जातो. ईश्वराचे भक्त, धार्मिक पुरुष, विवाह करून ग्रहस्थी सदाचारी जीवन जगणारा असे संत या शब्दाचे आणखी अर्थ सांगितले जातात.
गाथा : ३८१
पामोज्ज बहुलो भिक्खु पसन्नो बुध्द सामने !
अधिगच्छे पदं सन्तं संखारुपासमं सुखं !!
भावार्थ - प्रमोदाने ( आनंदाने ) फुललेला,बुध्द शासनात ( बुद्धांची शिकवण आणि सिद्धांत यांत) प्रसन्न राहणारा भिक्खु संस्काराचा उपशम करणाऱ्या सुखदायी शांत पदाला ( संत पदाला ) पोहोचेल.
वर उद्धृत केलेल्या गाथांचा अभ्यास केल्यानंतर एव्हाना स्पष्ट झाले की संतांचा धर्म चिरकाल टिकणारा,प्रकाशदायी आहे;
संत मिथ्या धारणा नष्ट करून शांती प्राप्त करणारे,काया वाचा व मन याद्वारे तिन्हीत शांती सामावून (शांती प्राप्त करून) लौकिक लाभ,तृष्णा त्यागून मिथ्या धारणा सोडून सुखदायी असे शांत पद (संतत्व) प्राप्त करणारे लोक म्हणजे संत होत.
इथे संत या शब्दाची डॉ.बड़थवाल यांनी प्रतिपादलेली दोन्हीही रुपे दिसतात.ग्रहस्थी धर्मात राहूनही विरक्त,विरागी,निवृत्तीमार्गी आयुष्य जगणारे संत इतिहासात होऊन गेलेत.त्यावर महानुभावांनी सत्यावर विश्वास ठेवला,सत्याचा अनुभव घेतला आणि सत्याचा अनुभव घ्या असे लोकांना परोपरीने सांगितले.तसा आग्रह धरला !
या ठिकाणी एका कथेची आठवण झाली.
एका जपानी कथेनुसार एकदा एका भांडखोर समुराई योध्याने एका झेन गुरूंना आव्हान दिले की, त्यांनी स्वर्ग म्हणजे काय आणि नरक म्हणजे काय, हे स्पष्ट करून द्यावे; पण त्या साधूने त्याला तुच्छतेने उत्तर दिले," तू तर एक आडमुठा रासवट आहेस.
तुझ्यासारख्या माणसाला वेळ देण्याइतका मी रिकामा नाही,झाले ! त्या योद्ध्याच्या प्रतिष्ठेला धक्का बसला,त्याच्या डोक्यात राग भडकला आणि त्याच तिरिमिरीत त्याने आपली तलवार उपसली आणि किंचाळला," तुझ्या या उद्धटपणाबद्दल मी तुला ठार करीन."तेव्हा तो साधू शांतपणे एवढेच म्हणाला, " हा नरक आहे."आपण ज्या संतापाच्या वणव्यात सापडलो होतो त्याकडे गुरु बोट दाखवत आहेत हे सत्य पाहिल्यावर तो योद्धा शांत झाला.आपली तलवार पुन्हा म्यान केली आणि वाकून साधूला नमस्कार केला. त्याने दाखवलेल्या अंतर्ज्ञानाबद्दल त्याचे आभार मानले.आणि हा स्वर्ग आहे," साधू म्हणाला
जे अनावश्यक म्हणून फेकून दिले जाते, त्यातूनही जीवनाचे सत्व शोध महाराज संत साधक असतात.याचा अर्थ जे किरकोळ वाटते, साधे भासते त्यातच सुंदर तत्त्व असते,त्यातच आयुष्य सुंदर बनवण्याचे तंत्र असते!असे जीवनमूल्य शोधणारे संत असतात.
सत्याचा शोध घेणं,सत्याला प्रस्थापित करणे हे संतांचे जीवित ध्येय होते. म्हणून संत सत्याला आपल्या विचारसरणीत महत्त्व देतात सत्याला इतके महत्त्व देतात कि सत्य हाच त्यांचा ईश्वर आहे म्हणून संत रविदास म्हणतात.
सत्य ईश का रुप है सत्य शक्ति अपार !
रविदास सत्य कूं धारणा देई है पाप निवार !!
सत्याला ईश्वराइतचे महत्त्व देणाऱ्या संतांचा प्रवास हा सत्यशोधनाचा प्रवास आहे.पण सत्य म्हणजे स्वानुभवातून प्राप्त होते ते!संत सत्याबाबत असेच मांडतात तेच खरे ज्ञान असे त्यांचे प्रतिपादन असते
एका ऐतिहासिक सत्याजवळ येऊन मी थांबलो. करुणा,सेवाभाव,समर्पण भाव ही बौद्ध विचारधारेने या जगाला दिलेली पहिली देणगी आहे नंतर इतरांनी ती उचलली..!
युटोपिया आणि संत रविदास यामध्ये बेगमपूर कविता आहे.दुःख विरहित शहर ही कविता १५ व्या शतकातली आहे पण त्यातला विचार अगदी आजचा आधुनिक असा आहे,डॉ.गेल ऑम्वेट या रचनेचा 'भूतलावरचा युटोपिया'असा गौरव करताना दिसतात.
प्राचीन गण व्यवस्था ही प्रथम स्त्रीसत्ताक होती.कॉ. शरद पाटील यांनी त्यांच्या 'दास शूद्रांची गुलामगिरी' या पुस्तकाचे साधार सिद्ध केले आहे.'राज्ञी' किंवा 'राष्ट्री' हा बहुमान ( किताब ) राज्यकर्त्या स्त्रीला दिला जायचा. या 'राष्ट्री' शब्दातील 'राट्' या शब्दाचा अर्थ 'राज्य करणारी स्त्री' असा आहे.'निघण्टु' या संग्रहाचा हवाला देऊन कॉ.शरद पाटील सिद्ध करतात की राजपदाची उत्पत्ती स्त्रीपासून झाली.भगवान महावीर भगवान बुद्धांनी स्त्रियांना आपल्या धर्मात - धम्मात प्रवेश दिला. ही अभूतपूर्व घटना होती.वैदिक धर्मात काही धर्मवादीनी स्त्रियांची वर्णने आढळतात.पण त्यांना पूर्ण स्वातंत्र्य होते,असे म्हणता येणार नाही.
गार्गी - याज्ञवल्क यांच्यातील संवाद पुरेसा बोलका आहे. इथून पुढे काही बोललीस तर तुझे शिर धडा वेगळे होईल,असे याज्ञवल्क्य तिला म्हणतो. तुझे शिर धडापासून वेगळे केले जाईल,तोडले जाईल,असाच त्याचा अर्थ होतो. स्त्री स्वतंत्र,चिकित्सक होती,त्याचबरोबर
स्त्रियांना धमकावले जात होते.हे इथे दिसून येते.
जैन व बौद्ध धर्मात स्त्रियांना उपासिका,भिक्षुनी, - भुक्खुनी होता येत होते.जगातील पहिले स्त्री- वाड्मय म्हणजे या बौद्ध भिक्खूंनीनी लिहिलेल्या 'थेरी - गाथा होत. तसेच शरण व शरणी यांनी 'वचन साहित्य निर्माण केले.१२ शतकात पन्नास वर्षांहूनही कमी कालावधीत उच्च व नीच अशा समाजाच्या सर्व थरातून आलेल्या,स्वतःचा वेगळा 'स्वर' असलेल्या तीनशेहून अधिक कवींना या शरण आंदोलनाने लिहिते केले. इतिहासातील ही अभूतपूर्वच घटना आहे. या आंदोलनाने ३३ वचनकार कवयित्री तयार शिक्षणाचा अधिकार नसलेल्या शूद्र, अतिशूद्र व स्त्रिया यांनी जे क्रांतिकारी साहित्य निर्माण केले त्याला इतिहासात तोड नाही.
चेन्नबसवण्णा,सिद्धाराम,सकलेश मादरस,मोळीगेय मारय्या आदी संत अक्कमहादेवी,अक्कनागम्मा,गंगाबिका,
नीलम्मा आदी शरणी संतांनी वचन साहित्य लिहिले.भुक्खुनी कुठेही एकट्या संचार करत असत.स्वतंत्रपणे धम्मप्रचार करत असत. कित्येक भिक्खुनींनी कठीण असे अर्हत पद व निर्वाण प्राप्त केले होते.
संत चळवळीने स्त्रियांना आपल्या वारकरी संघात घेतले.त्यांनाही लिहिण्यास चालना दिली. त्यातूनच मुक्ताबाई, जनाबाई,सोयराबाई,निर्मळा लाडाबाई,लिंबाई या स्त्रिया लिहू लागल्या जनाबाई तर आद्य विद्रोही कवित्री म्हणता येईल अशी कोणतीही भीडभाड न बाळगता लिहिणारी संत आहे.
संत कबीर व संत रोहिदास ज्या काळात जीवन कंठत होते त्या काळात कडवट मुस्लिम सत्ता व कर्मठ हिंदू पातशाही राज्य करत होती. अशा कठीण,स्फोटक काळात कुठल्याही धर्मावर भाष्य करणे म्हणजे स्वतःच्या जीवाशी खेळ करण्यासारखेच होते.एक तर पाशवी कैद किंवा यातनामय देहदंड! दोन्हीही शिक्षा म्हणजे साक्षात मृत्यूच! अशाही परिस्थितीत हे दोन्ही महापुरुष धर्मचिकित्सेचा काटेरी मार्ग तुडवत होते.फरक एवढाच होता,कबीराचा हल्ला तिखट,बेगुमान,आणि धारदार होता तर रैदासांचा शांत,सयंत पण शत्रूच्या गंडस्थळावर नेमका वार करणार होता.त्यासाठी त्यांनी स्वतंत्र संप्रदाय निर्माण केले.चळवळ उभी केली साहित्य निर्माण केले.त्यांचे जे तुटपुंजे साहित्य आज जे उपलब्ध आहे ते सारे लोकांना उद्देशून लिहिलेले आहे त्यांनी विविध पदे साखी निर्माण केल्या.ते त्यांचे साहित्य म्हणजे विविध विषयांवर केलेली त्यांची भाष्येच आहेत. पवित्र समजलेल्या तीर्थक्षेत्रांना भेटी देण्यापेक्षा हृदयात वसत असलेल्या स्वतःला जाणा असा सल्ला देतात.रैदास इथे जणू श्रद्धांचीच शव परीक्षा अगदी सौम्यपणे पण मार्मिक शब्दात ते मांडतात,भेटी देऊन काय उपयोग? तिथे ईश्वर भेटत नाही. स्वतःच्या मनात ( दिल) स्व:ला शोधा,तिथेच दिलदार मिळेल.
( तिथेच मनाच्या मुक्तीचा मार्ग दिसेल ) खरे तर ती अतिशय मनोज्ञ अशी भावनिक,बौद्धिक - तार्किक आवाहने आहेत.हे सर्व वाचत असताना मी किती अज्ञानी असत्याला सत्य म्हणणारा आहे याची तीव्र जाणीव झाली.
योग याग म्हणजे भक्ती नव्हे,घरदार सोडून जाणे ( कुल कानि गोलाई),आहार कमी करणे ( उपास-तापास), वैरागी होऊन फिरणे,वेद - शास्त्रे यांची वारेमाप स्तुती - फुशारकी मारत फिरणे, मुंडन करणे आदी बाह्याचार करणे म्हणजे भक्ती करणे नव्हे,असे बजावून रैदासांनी स्पष्ट शब्दात खोट्या भक्तीला नाकारले आहे.
यासंदर्भात एक छान वाक्य आहे-'भगति न कथै ज्ञान' याचा सरळ साधा अर्थ 'भक्ति ज्ञान देत नाही'.वरील प्रकारच्या तथाकथित भक्तीमुळे ज्ञान वाढत नाही.भक्ती ज्ञान सांगत नाही.भक्ती केल्याने ज्ञानाची निर्मिती किंवा प्राप्ती होत नाही. हे त्यांचे वाक्य म्हणजे बॉंब गोळच आहे.भक्ती ज्ञानाचे प्रतीक होऊ शकत नाही हा या वाक्याचा गर्भितार्थ आहे.
विचारांच्या,बुद्धीच्या,जाणिवेच्या घनदाट जंगलामध्ये वाचकाला फक्त पुस्तक सोबत घेऊन प्रवास करावा लागतो. पण हा सत्य सांगणारा वैचारिक संवेदनशील भावनिक गुंतागुंत असणारा हा ग्रंथ वाचत असताना मी या जंगलामध्ये एकटा नव्हतो तर स्वतः लेखक माझ्या सोबत होते अशा भावनेने माझे मन उचंबळून येत होते.
सिद्धार्थ पूर्वीची यात्रा हरमान हेसे या पुस्तकात खूप छान जीवनतत्व सांगितलेलं आहे.गोविंद व सिद्धार्थ यांच्यातील हा संवाद आहे.गोविंद बुद्धाला शरण गेला आहे.व ते त्यांचे शिष्य आहेत.तर सिद्धार्थ स्वानुभवातून शिकत आहे शिकलेला आहे.
सगळ्या गोष्टींचा प्रतिकार न करता जगावर प्रेम करता यावं,कुठल्यातरी कल्पनारचित,
मनोवांछित,परिपूर्ण सृष्टीशी या जगाची तुलना करण्याचा मोह न व्हावा आहे,तसंच ते ठेवून आणि काही काळ आपण त्याचे रहिवासी झालो याचा आनंद मानीत त्याला अखेरचा मुजरा करीत प्रेमानं त्याचा निरोप घ्यावा.
सिद्धार्थने जमिनीवरचा एक दगड उचलून घेतला.तो हाताळत त्यांन म्हटलं,'हा दगड आहे,कालावधीत त्याचं मातीत रूपांतर होईल त्या मातीतून तो कदाचित वनस्पतीचं,पशुच वा मानवाचं रुप घेईल.
यापूर्वी मी म्हटलं असतं:हा नुसता दगड आहे,तो कवडी किमतीचा आहे.माया जगताचा घटक आहे.परिवर्तनाच्या चक्रात फेरे घेतो तोही कदाचित मनुष्य होईल,चित् स्वरूप होईल,म्हणून दगडही महत्त्वाचा आहे.
पण आता मी असा विचार करतो :
हा दगड आहे,त्याचवेळी तो प्राणी आहे,ईश्वर आहे.आज ती एक वस्तू आहे आणि उद्या ती वेगळेच काही होणार आहे म्हणून तिच्याकडे प्रेमादरानं मी पाहतो असं नव्हे,तर आधीपासून ती सर्व काही आहे आणि निरंतर ती सर्वच काही असणार आहे. या दृष्टीने मी तिच्याकडे पाहतो.
तो दगड आहे आणि या क्षणी मला दगडाच्या रूपात दिसत आहे एवढंच माझ्या प्रीतीला पुरेसं आहे.त्यावरच्या खाणाखुणा,खाचा आणि खवले,त्याचा पिवळसर करडा रंग,त्याचं काठिन्य,आपटला असता त्यातून निघणाऱा ध्वनी,त्याच्या पाठीवरचा कोरडेपणा अगर ओलावा या सर्वासर्वांत मला मूल्य आणि अर्थ दिसतो.कित्येक दगडी असे असतात की,त्यांचा स्पर्श तेलासारखा किंवा साबणासारखा लागतो. कित्येक पानांसारखे रेषाळा किंवा वाळूसारखे रवाळ दिसतात.प्रत्येक भिन्न असतो.आणि त्याच वेळी आपल्या रीतीनं दगड असतो,याचाच मला मोठा आनंद होतो होतो अपूर्व नवलाईचा आणि पूजनीय वाटतो.!
हा ग्रंथ वाचनाचा प्रवास म्हणजे स्वतःसाठी स्वतःहून केलेला प्रवास.
सत्य हाच ईश्वर - 'सत्य ईश का रुप'
निर्गुण परंपरेचा पाया सत्यावर आधारित होता.'सत्य विद्या को पडो. सदा प्राप्त करो ज्ञान'असे जे रैदास म्हणतात,त्याला भरपूर महत्त्व आहे. ज्ञान घेतानासुद्धा सत्यावर आधारित,सत्याचे अधिष्ठान असलेले ज्ञान घ्या असे कसे बजावतात.असत्य,गोटे असे कोणतेही संस्कार ते टाळायला सांगतात.
सत्याला ईश्वराच्या ठिकाणी प्रतिष्ठित करणे म्हणजे त्याद्वारे ईश्वराची प्रतिष्ठा वाढविणे नव्हे ! सत्य हे महान मानवी मूल्य आहे! उलट ईश्वराला सत्याच्या ठिकाणे मानने, प्रतिष्ठित करणे म्हणजे ईश्वराची प्रतिष्ठा वाढविण्यासारखेच आहे. म्हणूनच निर्गुण परंपरा सत्यालाच ईश्वर मानते आणि सत्यात अपार शक्ती आहे असे ठामपणे सांगतात.
सत्याच्या आश्रयाने जगा,सारे जग जर एका बाजूला झाले,जगाने साथ जरी सोडली तरी सत्याच्या जगणे सोडू नका,असा मौलिक सल्ला रैदास देतात.खरंच किती उच्च जीवनातील तात्विक सत्याची खोली वाढणारं जीवन तत्व संत जगत असतात.या ग्रंथामध्ये सर्वांगीन जीवनाचे धर्माची सत्याची परिभाषा समजावून सांगितली आहे.यामधील संतांना,या ग्रंथाच्या भेटी मधून मला लवचिकता नम्रता शिकायला मिळाली.ते या ग्रंथाचे लेखक डॉ.रवींद्र श्रावस्ती यांच्यामुळे,ग्रथांच्या मलपृष्ठावरील शब्दरूपी आरसा मनस्वीपणाने डोळ्यापुढे धरून ग्रंथाबाबत उच्चकोटीचे भाष्य करणारे डॉ. सूर्यनारायण रणसुभे,व नाग - नालंदा प्रकाशन या सर्वांचे मनःपूर्वक आभार जीवनातील सत्य समजावून सांगण्यासाठी यांनी केलेले अपार कष्ट, हे म्हणजे धाडसी पाऊलच सर्वांना विनम्र धन्यवाद..
बुद्धाने तर दुःख विमुक्तीचा महामार्ग दिला. जीवनाला जसं आहे तसं जाणा,त्याला सामोरे जा.दुःखाचे कारण शोधा म्हणजे त्यातच त्याचा उपायही सापडेल,असे सांगून ते थांबले नाहीत तर दुःख मुक्तीसाठी त्यांनी नवा मार्ग दाखविला,प्रज्ञा, शील आणि समाधी याद्वारे दुःख मुक्ती शक्य आहे,असे दाखवून दिले.
सृष्टीच्या घटकांविषयी ज्ञान आणि त्यातून आलेला व्यापक दृष्टिकोन ही प्रज्ञा आहे. चांगल्या उपजिविकेसाठी कोणते कर्म केले पाहिजेत,कोणते टाळले पाहिजेत;
आपली उपजीविका करताना दुसऱ्याला दुःख,वेदना,इजा होणार नाही हे पाहणे हेच शील आहे.प्रज्ञापूर्ण आणि शीलमय आयुष्य जगण्यासाठी चांगले प्रयत्न करत राहणे:जागृती,विवेकी जगने आवश्यक असते.हे सर्व जगत असताना आपण हे असेच करत आहोत ना? दुष्कर्म आपल्या हातून घडत नाही ना?आपल्याकडून कुशल कर्मेच होत आहेत ना,हे सारं पुन्हा पुन्हा बघणं अत्यावश्यक असते.सगळ्यात शेवटची पायरी म्हणजे सम्यक समाधी,समाधी म्हणजे फक्त ध्यानधारणा नव्हे.समाधीचा अर्थ जागृती असाही होतो.सम्यक समाधी म्हणजे व्यक्तीने समाजाशी आनंदाने समन्वित व तल्लीन होणे.हे सर्व समजून घेण्यासाठी आणि ते सर्व आपल्या व्यक्तिमत्वात एकरूप होण्यासाठी म्हणून तर संत रैदास 'निरंजन ध्यावो' चा सल्ला देतात. ध्यान लावून बसणे म्हणजे निष्क्रियता नव्हे. आपण जे कार्य हाती घेतले आहे त्या कार्याप्रती सदैव एकनिष्ठ राहता यावे,स्वत:ला बाहेरील अनावश्यक दबावापासून ताणापासून मुक्त राहता यावे म्हणून ध्यान,समाधी आवश्यक असते.स्वतःला कार्यप्रवण,निर्भय,दोषरहित बनविण्यासाठी साधक ध्यानाची विशिष्ट तंत्र आत्मसात करतात.'निरंजन'अवस्था प्राप्त 'निरंजन' ही स्थिती किंवा अवस्था काय आणि माया (मन) यावर नियंत्रण करुन,शून्यतेचा बोध होऊन शक्य होते.हेच निरंजन अवस्था प्राप्त करण्याचे मर्म.रैदास म्हणतात.'कह रैदास मरम जू पाऊ,देव निरंजन सतकरि ध्याऊ!
या ग्रंथामध्ये अनेक अज्ञात असणाऱ्या,असत्य सत्य म्हणून सांगणाऱ्या,परंपरा ह्या सगळ्याच गोष्टींबाबतचे सत्य क्रांतिकारकपणे मांडले आहे.
यासंदर्भात बरेच साहित्य नष्ट झालेले आहे. (केलेले आहे) यातील सिद्धांत,पुरावा,संदर्भ खरोखरच अलौकिक अभ्यासपूर्ण व जीवणाला एक नवीन दृष्टिकोन देण्यासारखे आहे. प्रत्येक मनुष्याने आपल्या स्वत:साठी हा ग्रंथ एकदा नक्कीच वाचावा.हा ग्रंथ आपल्या सोबत असणे म्हणजे इतिहास आपल्या जवळ आहे.
असे वाटते,कबीर,गोरखनाथ,सुफी पंथ, बुध्द धम्म,महानुभाव पंथ,संत नामदेव,संत तुकाराम सर्व संतांची धर्माची,संतांची अभ्यासपूर्ण मांडणी यामध्ये आहे.
संत साहित्यात गीता,भागवत पुराण व योगसूत्रे यांचा उल्लेख आढळतो.भगवद्गीता हा ग्रंथ महाभारताचा एक भाग आहे. त्यात पिंपळमहात्म्य,वेदविरोध,अर्हताचेगुण,
अहिंसा,यज्ञविरोध इत्यादी बौद्ध धर्माच्या वैचारिक विश्वातील गोष्टी आढळतात.जर्मन विद्वान गार्ब त्यांनी गीतेचा काळ इ.स.२०० मांनला आहे.अनेक विद्वानांनी महाभारत आणि पर्यायाने भगवद्गीता ही बुध्दोत्तर आहे असे मांडले आहे.
एक भिक्खु भिक्षा मागून जगण्यासाठी,तगून राहण्यासाठी त्याला ९० समर्थक घरे असावी लागतात. रोज तीन घरे याप्रमाणे भिक्षा मागून एक भिक्खु तीस दिवस गुजराणकरू शकत असे.नव्या परिस्थितीत लोक घाबरून उघडपणे भिक्षा देईनासे झाले त्यामुळे अशा भिक्खूंना गृहस्थी जीवण जगावे लागले परंतु त्यांनी धम्मप्रचार,
धम्मदेशना सोडली नाही,तर नव्या रूपात बौद्ध धम्माला ते मांडत राहिले.
सुफी संतांची परंपरा प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या उदयापूर्वीपासूनची परंपरा आहे,असे ओशोसहीत अनेक विद्वानांचे मत आहे, त्याचे कारण सुफींचे विचार व आचारसंहिता इस्लाम धर्मातील प्रथा-परंपरा यापेक्षा काही बाबतीत भिन्न आहे. पण तरीही सुफी परंपरा इस्लामचा भाग आहेच. प्रेम,भक्ती,क्षमाशीलता सहिष्णुता,ज्ञानाचा प्रसार व प्रचार यांना महत्त्व दिले आहेच.
ज्या ठिकाणी मी नम्र,नतमस्तक झालो तो प्रसंग या ठिकाणी लिहुन मी थांबतो.
संत कबीर व संत रैदास यांचे एक संयुक्त चित्र बादशहा* शहाजहान यांचा थोरला पुत्र ' दारा शुकोह ' यांनी
तयार करून घेतले होते. ते त्यांनी आपल्या पिताश्रींच्या दरबारी चित्रकारांकडून म्हणजे फकीर उल्ला यांच्याकडून सन १६४० मध्ये करवून घेतले होते. सध्या हे पेंटिंग दिल्लीतील नॅशनल म्युझियममध्ये ठेवले आहे.दारा शुकोह यांचे त्यासाठी आपण ऋणी असले पाहिजे. कारण त्यांच्यामुळे हा ठेवा आज उपलब्ध राहू शकला.दारा शुकोह हा सुफी तत्त्वज्ञ होता. तो फक्त राजपुत्र नव्हत;तर कवी,बहुभाषा कोविद,ग्रंथकार,अनुवादक होता. सुरुवातीच्या काळात तो सुफी चळवळीतल्या चिश्ती पंथाचा अनुयायी होता. नंतर तो कादरी पंथाच्या प्रभावात आला व त्याने या पंथाचे अनुयायीत्व पत्करले.त्याची सुफी संतांशी घनिष्ठ मैत्री होती. त्याचबरोबर त्यांची हिंदू धर्मातून पुढे आलेल्या संतांशी देखील चांगले सख्य होते. तो या दोन्ही धर्माचा समन्वयवादी म्हणूनही ओळखला जातो.
जाता .... जाता...
हा ग्रंथ वाचत असताना स्वतःमध्ये बदलाचा स्वानुभव मी घेत होतो. चिंतन करत होतो, मनन करत होतो,समजून घेत होतो.गंभीरपणे विचार करत होतो स्वतःला समजून घेणं,'जाग्यावर असणं म्हणजे काय?' या प्रश्नाचे उत्तर मला नक्कीच मिळाले.
तुमच्या आशा कधीही सोडू नका.एकच पान जंगलाची सुरुवात असू शकते…
या विचाराची प्रगल्भता दाखवणारा हा ग्रंथ ..
एकवेळ अवश्य वाचून आपल्या संग्रही जतन करून ठेवावा असा आहे.