त्याच्या ह्या बोलण्यावर माईला खरं तर नवल वाटलं. कारण शेत कसायला देताना मजूरपावती करण्याच्या वेळी बोलण्याच्या ओघात बापूंनी विश्वनाथ अन् राधू दोघंही सज्जन माणसं आहेत,त्यांच्याकडेही शेती भरपूर आहे,आपली जमीन लागूनच आहे,पुढेमागे आपण विकायला काढली तर आपल्याला प्राधान्य मिळावं म्हणून ते आपली जमीन कसायला मागताहेत.पण मी जमीन सुखदेवला देणार आहे कारण त्याला जरी पोटापुरतं मिळत असलं तरी त्याचा बारदाना काही फार मोठा नाही.त्यामुळे आपली जमीन कसायला जास्त वेळ तो देऊ शकेल,असं म्हटलं होतं.माईनी विचार केला,आपल्याला काही प्रत्यक्ष अनुभव नाही.सुखदेव म्हणतो त्याप्रमाणे रागाच्या भरात दिल्या असतील त्यांनी शिव्या.सुखदेव कशाला खोटं बोलेल ? त्यांनी सुखदेवला विचारलं,"बरं,तुझ्या जेवणाचं काय ? नसेल झालं तर गरम भाकरी आणि पिठलं करून वाढते."
सुखदेव नकार देत म्हणाला, "नका तरास घेऊ माई.मी एका दोस्ताबरोबर खाल्लंय.आता काही भूक न्हाई. सांजच्यालाच घरी जानार होतो.पन कामच आटोपलं न्हाई.आता अंधार पडल्यावर जाऊ नाही म्हन्तो, मघाशीच बाजारात जरा तनातनी झाली.कुनी सांगावं, रातच्याला काही दगाफटका झाला तर ? म्हून आज रातच्याला इथंच लवंडतो.काही हाथरायला आसलं तर द्या.बाहेर मारुतीच्या पारावर पडतो जाऊन.सकाळी झुंजूमुंजू झालं की जाईन.तीन कोसाचं तर अंतर. सकाळचा चा घरी जाऊनच पिईन."
माईंनी त्याला झोऱ्या दिला.पांघरुणाचं विचारलं तर नको म्हणाला.'उपरनं हाय,तेच घिईन पांघरायला.'असं म्हणून झोऱ्या घेऊन तो वाड्याबाहेर पडला.
माईंना तो तेव्हाही अस्वस्थच वाटला.त्याचं माईंच्या बोलण्याकडे लक्ष नव्हतं.पण हा बाजारात झालेल्या भांडणाचा परिणाम असावा,तरुण वयात लहानसहान गोष्टींमुळे मनाला त्रास होतो,असं वाटून माईनी तिकडे दुर्लक्ष केलं.
रात्रीचा साडेआठचा भोंगा वाजला.थोडावेळ अभ्यास करून मुलांचीदेखील झोपेची वेळ झाली. झोपण्याआधी माईच्या सांगण्यावरून यशाने बाहेर जाऊन ओट्यावरून पाहिलं,सुखदेव मारुतीच्या पारावर झोऱ्यावर पडला होता.पण झोपला नव्हता.सारखा ह्या कुशीवरून त्या कुशीवर वळत होता.
रात्री बाराच्या सुमारास जवळच्या श्रीकृष्ण टॉकीजमधून रात्रीचा शो संपला.
थोड्यावेळाने वाड्याचा दरवाजा खटखटण्याचा आवाज आला.माईची झोप सावध होती.त्या लगेचच उठल्या. त्यांनी आतूनच 'कोण आहे ?' विचारलं,
"माई,भी सुखदेव.इथे पारावर लई डेकनं चावत्यात. गावाबाहेर शनीच्या देवळात जाऊन झोपतो.पहाटंला झोऱ्या आनून देतो.मग गावाकडं जाईन."
"बरं." माई दार न उघडताच म्हणाल्या अन् परत अंथरुणावर येऊन पडल्या.पहाटे नेहमीप्रमाणे त्यांना जाग आली.प्रातविधी आटोपून त्यांचं भूपाळ्या म्हणणं चालू असतानाच सुखदेव झोऱ्या परत करायला आला. शनीच्या देवळात चांगली झोप लागली म्हणाला.आता त्याचा चेहराही शांत,समाधानी दिसत होता.ते पाहून माईंनाही बरं वाटलं.सुखदेव गेल्यावर माई आपल्या नित्याच्या कामाला लागल्या.यशा आणि मंदाची सकाळची शाळा असल्याने ते उठून त्यांच्या तयारीला लागले.नास्ता करून शाळेत गेले.माईंची देवपूजा झाली. मुक्ता मध्ये मध्ये लुडबुड करत होती.तिच्याशी बोलता बोलता माई कणीक भिजवत होत्या.तेवढ्यात सुखदेवचा आवाज आला.हा पहाटेच गावाला गेला आणि आता अकरा वाजता परत कशाला आला असेल ? ओच्याला हात पुसत माई स्वैपाकघरातून ओसरीवर आल्या.सुखदेव चौकातच उभा होता.त्याचा नेहमीचा तांब्याच्या वर्णाचा चेहरा तांबडालाल झाला होता शिवाय तो खूप थकलेला आणि चिंताग्रस्त वाटत होता.
"काय रे सुखदेव,काय झालं?" माईंनी काळजीच्या सुरात विचारलं.
"माई,तुम्हाला झोऱ्या देऊन गावाकडे गेलो तर आमच्या गावाच्या वेशीपाशीच
राधू, विश्वनाथ अन् त्यांचे सोयरे दिसले.रात्री ते खळ्यात झोपले होते.त्यांना कुणीतरी बेदम मारलं होतं म्हनं. चांगलेच सुजलेले दिसले.काल अमुशा.अंधार होता.अन् तोंडाला उपरनं बांधलं होतं म्हून मारनाऱ्यांची ओळख पटली न्हाई.पन त्यांचा वहीम माझ्यावर हाय. म्हून ते पोलीस कम्प्लेंट करायला इकडंच येत होते.मग मी घरी जाऊन चहा पिलो अन् उलट्या पावली माघारी फिरलो. संगटी बापपन आलाय.तो गेलाय पोलीस ठेसनात.मी तुमच्या कानावर घालायला हिथं आलू."
माईंना हे ऐकून आश्चर्यच वाटलं.त्या मनात म्हणाल्या, 'काय देव तरी एखाद्याच्या मागे लागतो बघा !'
"अरेपण,तू रात्रभर इथेच झोपलास,पहाटे माझ्यासमोरच झोऱ्या देऊन गावाकडे गेलास,तू कसा काय मारणार त्यांना ? त्या दिवशीच्या भांडणाच्या रागातून त्यांनी तुझं नाव घेतलं असणार."
माईंच्या बोलण्यामुळे सुखदेवच्या चेहऱ्यावरचा ताण कमी झाला."बघा ना माई,गरिबावर इनाकारन नाव घेत्यात.तुमची जमीन त्यांना कसायला दिली न्हाई म्हून हा राग.मी सांगू का पोलिसांना ? माईसाहेबांची साक्ष हाय! रात्री मी हिथंच होतो.बापूसाहेबांचा गावात अन् पोलिसात चांगला दाब हाय.त्यामुळे तुमच्या शब्दाला लई किंमत हाय.तुमच्या एका शब्दावर गरिबावरचं बालंट जाईल.न्हाई तर पोलीस धरून लई हान्तील इनाकारनच.त्या लोकाईचं काय हय ! लई बक्कळ पैका हाय त्याहीच्याकडं पोलिसांना दाबायला."
माई तात्काळ म्हणाल्या,"तू काही काळजी करू नकोस. खुशाल माझं नाव सांग.गरज पडली तर मी येईन कोर्टात साक्ष द्यायला."
माईंनी आश्वासन दिलं अन् त्याबरोबर सुखदेवचा चेहराच पालटला.त्याच्या चेहऱ्यावरची काळजी नाहीशी झाली.तो एकदम ताजातवाना दिसायला लागला.खरं तर,बापाला पोलीस स्टेशनात पाठवून सुखदेव ह्याच उद्देशाने वाड्यावर आला होता.माईंना 'तुम्ही साक्ष द्याल का?' हे विचारायची त्याची हिंमत होत नव्हती.पण कनवाळू माईंनी गरिबाला पोलिसांचा त्रास होऊ नये म्हणून स्वतःहून 'मी साक्ष द्यायला येईन' असं सांगितल्यावर सुखदेवने सुटकेचा निःश्वास टाकला. आता कुठलंही कोर्ट त्याला दोषी ठरवणार नव्हतं. किंबहुना आता पोलीस त्याला त्रास देण्याची सुतराम शक्यता नव्हती.गावातल्या एका प्रतिष्ठित घराण्यातल्या पापभीरू स्त्रीने सुखदेव त्या रात्री गावातच होता अशी साक्ष देणं हा सुखदेवचा हुकमी एक्का होता.तो तत्परतेने माईंच्या पाया पडला.माईंनीही त्याला 'काळजी करू नकोस, सुखी राहा',असा मनापासून आशीर्वाद दिला.माईंचा निरोप घेऊन सुखदेव पोलीस स्टेशनात जाण्यासाठी म्हणून वाड्याबाहेर पडला.माईही आपल्या कामाला लागल्या.संध्याकाळी पाचच्या सुमारास सुखदेवचा बाप वाड्यावर आला.सुखदेवला पोलिसांनी चौकशीसाठी थांबवून ठेवलंय असं सांगायला तो आला होता.
माईंनी दिलेला चहा घेऊन तो घरी जायला निघाला. निघताना अदबीने माईंना म्हणाला,"माईसाहेब,तुमच्या दर्शनाचा योग आता वारंवार येनार.ह्या पोलिसांच्या झंजाटात आन् कोर्टाच्या लफड्यात लै येळ जातो.ह्या वक्ताला तुमची जिमीन कसायला घेतली नसती तर बरं झालं असतं.ही दुष्मनी फक्त त्या जिमिनीसाठी हाय. काय करनार ? भोग हैती सगळे.ईट्टल... ईट्टल..."
आपली जमीन कसण्यामुळे सुखदेव अन् त्याचं कुटुंब अडचणीत सापडलंय ह्याचं माईंना फार वाईट वाटून कोनकोंडं वाटायला लागलं.त्या दिवशी पूजा करतानादेखील त्यांनी त्या कुटुंबासाठी प्रार्थना केली. दुसऱ्या दिवशी सुखदेवचा बाप सकाळी दहाच्या सुमारास आला.वाड्यावरून तो पोलीस स्टेशनात जाणार होता.डोक्याला पिवळं मुंडासं बांधलेला, काळ्याभोर रंगाचा,सुरकुतलेल्या कातडीचा आणि मिचमिच्या डोळ्यांचा सुखदेवचा बाप सारखा कपाळावर हात मारून म्हणत होता -
"माईसाहेब,काय भोग आलेत हो ह्या वयात... बघा, जाय-यायची दगदग,वरती पैसा परी पैसा... बाहेर जेवन,चहा... काय कमी खर्च येतो काय हल्लीच्या काळात..."
माईंना ते लगेचच पटलं.खरंच तर आहे.माईंनी मनाशी काही विचार केला.त्या सुखदेवच्या बापाला म्हणाल्या, "तुम्ही येत चला इकडे जेवायला.पोरांबरोबर तुम्ही दोघं. त्यात काय ? चार भाकरी जास्तीच्या टाकायला मला काही त्रास नाही." पडत्या फळाची आज्ञा सुखदेवच्या बापाने शिरसावंद्य मानली.
माईंनी 'जेवायला येत चला' असं सांगितल्यापासून सुखदेव कोर्टाच्या तारखेसाठी आला की,तो आणि त्याच्याबरोबर त्याचा बाप वाड्यावर जेवायला यायचे. कधी त्यांच्याबरोबर गावातले काही लोकही असायचे. आल्यावर सुरुवातीलाच 'तुमची जिमीन कसायला घेतली आन हा कुटाना झाला बघा!' ही लापनिका दरवेळेस असायची.बरोबरचे लोकसुद्धा झिलकऱ्यासारखं त्यांच्या हो ला हो मिळवायचे.
खेड्यात मोकळ्या हवेत राहणाऱ्या आणि चार कोस सहज चालणाऱ्या ह्या मंडळीचा आहार चांगलाच दांडगा होता.एक एक जण एका बैठकीत चार-पाच भाकऱ्या सहज फस्त करी.संध्याकाळी परत चहाला हजर.ही मंडळी येऊन गेली की,थकलेल्या माई कापडाचं फटकुर डोक्याला घट्ट बांधून पडून राहत.ह्या मंडळीचं येण्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चाललं.त्याबरोबर त्यांच्यासोबत येणाऱ्यांची माणसांची संख्याही वाढत चालली होती.
एकदा जेवण झाल्यावर ओट्यावर ही मंडळी चंची काढून गप्पा हाणत बसली होती.तेव्हा त्यांच्या गप्यावरून त्यातले काही जण लग्नाचा बस्ता बांधायला आले होते,लग्नाचं कापडचापड खरेदी करणाऱ्या लोकांना सुखदेवचा बाप वाड्यावर जेवायला घेऊन आला होता,हे यशाला कळलं.त्याने ते माईंच्या कानावर घातलं.नंतर एकदा कोर्टाची तारीख म्हणून रविवारीच मंडळी आली.यशाने माईला हळूच कानात आज रविवार असल्याचं सांगितलं.माईंना सात्त्विक संताप अनावर झाला.त्यांनी सुखदेवच्या बापाला त्याचा जाब विचारला.तर तो धूर्त म्हातारा चपापला पण क्षणभरच. लगेच स्वतःला सावरून म्हणाला,
"माईसाहेब,सुखदेवच्या सांगन्यात गलती झाली.कोर्टात नाही तर वकिलाकडे जायचंय.त्यांनी बलिवलं मजूरपावतीचा कागुद घिऊन.काय है ना,ह्या तकलिफीनी पोराचं डोस्कं पन लै पिकून गेल्यागत झालंय.त्याला माफी करा.ह्या वक्ताला तुमची जिमीन कसायला घेतली नसती तर बरं झालं असतं... ही दुष्मनी फक्त त्या जिमिनीसाठी हय.काय करनार ? भोग हैती सगळे..."
आता माईंना ह्या लोकांची लबाडी लक्षात आली होती. मात्र ह्यातून बाहेर कसं पडावं,हे सुचेना.कोर्टात साक्षीला येते हे भावनेच्या भरात माई बोलून गेल्या होत्या. त्यामुळे बापूंना सांगण्याची आता त्यांनाही भीती वाटत होती.ह्या सगळ्या प्रकाराची बापूंना ते मुंबईत असल्याने काहीच कल्पना नव्हती.
पुढच्या वेळेला मंडळी आली.त्यांना जेवायला घालताना आपण फसवले जात आहोत,आपल्या चांगुलपणाचा ही मंडळी गैरफायदा घेत आहेत,ही माईंच्या मनातली भावना तीव्र झाली.योगायोगाने त्याच संध्याकाळी पुरुषोत्तम घरी आला.पुरुषोत्तम गावचा तलाठी होता. यशाचा मोठा भाऊ अशोक ह्याचा वर्गमित्र होता. पुरुषोत्तम बारा गावचं पाणी प्यायला होता.माईंना डोकं बांधून पडलेलं पाहून त्याने त्यांच्या तब्येतीची चौकशी केली आणि बोलण्याच्या ओघात त्याला माईंच्या डोकेदुखीचं कारण कळलं.आपल्या आईसारख्या असलेल्या आणि साध्या भोळ्या अशा माईंना झालेला त्रास ऐकून त्याचं माथं भडकलं.वरकरणी शांतपणा दाखवून त्याने माईंना विचारलं,
"पुन्हा कधी येणार आहेत ही मंडळी,काही कल्पना आहे का ?"
"मंगळवारी.बाजाराच्या दिवशी.आज मी ओट्यावर मैत्रिणीबरोबर ठिक्कर ठिक्कर खेळत होते ना,तेव्हा ते जायला निघाले होते.तेव्हा वाड्याबाहेर पडताना ते बोलत होते.तेव्हा मी ऐकलं." धाकटी मुक्ता पटकन् म्हणाली.
त्यावर पुरुषोत्तम म्हणाला "माई,मी मंगळवारी साडेदहा अकराला येतो.बघतो,तुमची जमीन कसण्यामुळे ह्या गरीब कुटुंबाला किती त्रास झालाय ते."
बोलल्याप्रमाणे मंगळवारी बरोबर साडेदहा वाजता पुरुषोत्तम घरी आला.ओसरीवर न बसता तो मुद्दाम आतमध्ये स्वैपाकघरात माईंशी गप्पा मारत बसला. अकराच्या सुमारास सुखदेव,त्याचा बाप आणि त्यांच्याबरोबर चौघेजण वाड्यात शिरले.ओसरीवर आलेल्या माईंना सुखदेवचा बाप म्हणाला,
"माईसाहेब,आज आम्ही सहाजनं जिवायला हाय बरं का,काय करनार ? तुमच्या जिमिनीमुळं जिवाला लै घोर झालाय..."
त्याचं वाक्य पूर्ण होतं न होतं तोच स्वैपाकघरातून पुरुषोत्तम बाहेर आला.त्याचा चेहरा संतापाने लाल झाला होता.त्याने दरडावून विचारलं,"काय रे भडव्या, खानावळीत वर्दी द्यायला आलास काय ? आणि हे बरोबर आणलेले लोक काय तुझ्या मयताला बरोबर आणलेस का काय ?"
पुरुषोत्तमचं एकंदर रूप अन् बोलणं ऐकून सुखदेवच्या बापाचे मिचमिचे डोळे विस्फारले गेले.कुणाला काय बोलावं ते समजेना.
पुरुषोत्तम पुन्हा ओरडला,"तुमचा बाप मुंबईला गेला तो काही कायमचा नाही गेला.तुम्ही ह्या देवीसारख्या बाईला फसवून कोर्टात साक्ष द्यायला मजबूर केलंत. आणि तू रे ए भुऱ्या,रात्री शनीच्या देवळात झोपायला जातो सांगून सरळ गावाला गेलास.त्या दोघांना गुरासारखं बेदम मारलंस.साळसुदासारखा सकाळी परत वाड्यावर येऊन झोऱ्या परत केलास नि गावाला निघालो असं सांगितलंस.रस्त्यात राधू अन् विश्वनाथ भेटल्यावर घरी जाऊन म्हाताऱ्याला घेऊन परत आलास.मी शनीमंदिराच्या पुजाऱ्याकडे चौकशी केली. त्या रात्री शनीमंदिरात तू गेलाच नव्हतास.खरं की नाही ?” आता सुखदेवचं धोतर ओलं व्हायचं शिल्लक राहिलं होतं.त्याचा बेरकी बापदेखील भीतीने लटलटा कापायला लागला.पुरुषोत्तमच्या आणि माईंच्या पायांवर लोळण घेत ते दोघे विनवण्या करत म्हणाले,
"एक डाव माफ करा.लै मोठी चूक झाली आमच्या हातून.परत वाड्यावर येनार नाही.बापूसाहेबांच्या कानांवर पन ही गोष्ट घालू नका." पुरुषोत्तम म्हणाला,"बापूसाहेब राहिले मुंबईला.निघा आता.नाही तर फौजदाराच्या कानावर मीच तुमचा पराक्रम घालतो,मग बघा,तो तुमची कशी सालटी काढतो ते."
मान खाली घालून सगळी मंडळी बाहेर पडली.माईंकडे वळून पुरुषोत्तम म्हणाला,"माई,आज तुमच्या खानावळीत एक पात्र माझं बरं का.खूप दिवसांत तुमच्या हातचं जेवण जेवलो नाही."
आज कितीतरी दिवसांनी माई मनमोकळं हसल्या.
●●● समाप्त ●●●