* विजय गायकवाड | Vijay Gaikawad

live

नमस्कार आपले स्वागत आहे. मी पुस्तके आणि मित्रांवर पैसे खर्च करतो,माझ्याकडे दगड आणि विटांवर खर्च करण्यासाठी पैसे नाहीत.- रस्किन बाँड.ही थोर माणसं व त्यांचे विचार मला पुस्तकात भेटलीत.ती भेटली आणि त्यांनी सांगितले कि, प्रत्येक दिवशी असं काही तरी करा की,ते तुम्हाला अधिक सुंदर उद्याच्या दिशेने खूप लांबवर घेऊन जाईल."- डोग फायरबाऊ.' सर्वियन कादंबरीकार मिलोराद पावीच यांचे एक वाक्य आहे ते म्हणतात - जोवर जगात पुस्तक वाचणाऱ्या वाचकांची संख्या बंदूकधारी सैनिका पेक्षा अधिक आहे तोवर काळजीच काहीच कारण नाही.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात.पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये.म्हणून अविरतपणे प्रयत्न करणारे मार्गदर्शक, मित्र धावून येतात.प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,डॉ.दीपक शेटे,आ.भरत बुटाले,प्रा.सर्जेराव राऊत,सुभाष ढगे,अनिल फारणे,डॉ.सुधीर सरवदे ,विश्वास खाडे, विनायक पाटील,संजय कुंभार,सतीश खाडे,मनोहर सुर्वे,गणेश खंदारे,तात्या गाडेकर, दादासाहेब गाडेकर, दादासाहेब ताजणे, पुस्तकातील घटना प्रसंग सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील यांनी केलेले आहे. मला लिहिण्याची प्रेरणा देणारी पुस्तके,लेखक,प्रकाशक,मित्र ही जगावेगळी माणसं माझ्या जीवनातील महत्वाचा टप्पा आहेत.... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ.मेघा गायकवाड, चिरंजीव मयान,माझ्या धावण्यातील गुरुवर्य नामदेव बरुरे,लुल्ला शेख मोठी ताई ,लहान ताई जयश्री शिंदे या सर्वांचेच मनापासून आभार व धन्यवाद मॅट्रिक फेल विजय गायकवाड

१०/२/२६

नरसंहाराची साक्षीदार / Witness to the genocide

इमॅक्युली इलिबागिझा…!!


▶ रवांडा.मध्य आफ्रिकेतला एक छोटासा देश. १९८० च्या दरम्यानचा काळ.या देशातल्या एका छोट्या खेड्यात शाळा भरली आहे.पाचवीतली मुलं आज पहिल्यांदाच या मोठ्या,माध्यमिक शाळेत आली आहेत. त्यातच एक आहे इमॅक्युली इलिबागिझा.

शिक्षक वर्गात येतात आणि शिकवायला सुरुवात करण्यापूर्वी हजेरी घेऊ लागतात.


"वर्गात कोण कोण 'हुतू' आहेत ?"


काही मुलं-मुली हात वर करतात.


मग पुढचा प्रश्न येतो, "कोण कोण 'तुत्सी' आहेत?"


इतर काही मुलं-मुली हात वर करतात.


"कोणी 'त्वा' मंडळी आहेत का वर्गात ?"


एखाद-दुसरा हात वर येतो.


रवांडामध्ये १९९४मध्ये झालेल्या वांशिक विच्छेदामध्ये १०० दिवसांत तुत्सी जमातीतले आठ लाखांहून अधिक लोक मारले गेले. या नरसंहारातून बचावलेल्या एका तरुणीची कहाणी.


शिक्षक आपली कुत्सित नजर इमॅक्युलीवर रोखतात आणि म्हणतात,"मी हुतूंचं नाव घेतलं तेव्हा तू हात वर केला नाहीस.

तुत्सींचं नाव घेतलं तेव्हाही हात वर केला नाहीस.तू त्वा तर नक्कीच नाहीस. मग कुठल्या जमातीची आहेस तू?"


हे काय चाललंय हे न कळल्यामुळे दहा वर्षांची इमॅक्युली आधीच गोंधळलेली असते.आपण कोणत्या जमातीच्या आहोत हे तिला माहितीच नसतं.ती घाबरून म्हणते,"मला माहिती नाही सर." 'कुठल्या जमातीची आहेस हे कळल्याशिवाय परत वर्गात येऊ नकोस',असं सांगून शिक्षक तिला वर्गाबाहेर काढतात.


आपण कोणत्या जमातीचे आहोत,या प्रश्नाचं उत्तर माहिती असणं इतकं महत्त्वाचं का आहे हे इमॅक्युलीच्या समजेपलीकडचं असतं.पण पुढे हा प्रश्न तिचंच नव्हे,तर तिच्या देशाचं भविष्य उलटंपालट करणार असतो. १९९४ मध्ये सगळ्या जगाला हादरवून टाकणाऱ्या भीषण वंशविच्छेदाची ती नांदी असते. 


त्या वंशविच्छेदात होरपळून निघालेल्या इमॅक्युलीने लिहिलेलं 'लेफ्ट टु टेल : डिस्कव्हरिंग गॉड अमिस्ट द रवांडन होलोकास्ट' हे पुस्तक आपल्याला रवांडातल्या नागरिकांनी भोगलेल्या नरकयातनांची झलक दाखवतं.नाझींनी केलेला ज्यूंचा नरसंहार ही इतिहासातली गोष्ट झाली,आणि आता नव्या न्याय्य युगात अशा अमानुष घटना घडणं शक्य नाही, अशा भ्रमात जगणाऱ्या आपल्याला हे पुस्तक हादरवून सोडतं.आपल्या माणसांपासून तुटून मृत्यूच्या छायेत जगण्याची वेळ येते तेव्हा माणसांचं काय होतं याचाही अनुभव ते आपल्याला देतं.अनेक कारणांमुळे इमॅक्युली आणि तिचं रवांडा आपल्याला आपलं वाटू लागतं.


इमॅक्युली इलिबागिझा ही खाऊन-पिऊन सुखी आणि सुशिक्षित घरात जन्मलेली मुलगी.तीन भाऊ आणि आई-वडील असं प्रेमळ सुखी कुटुंब.आई-वडील दोघंही कष्टांतून शिकत वर आलेले.

शिक्षणाशिवाय गरिबी हटणं शक्य नाही याची जाण असणारे,

त्यामुळे आपल्या मुलांनी शिक्षणाकडे लक्ष दिलं पाहिजे असं मानणारे. त्यांना आपल्या वागणुकीतून समानतेचं,प्रेमाचं तत्त्व शिकवणारे.सर्व माणसं समान आहेत आणि मुलांना लहानपणापासून भेदभावांबद्दल सांगून त्यांचं बालपण कलुषित करणं योग्य नाही असं मानणारे तुत्सी जमातीतले उदारमतवादी.

त्यामुळे वर्गात वांशिक हजेरी सुरू होईपर्यंत इमॅक्युली आणि तिच्या भावंडांना आपल्या देशात काय खदखदतं आहे याची कल्पनाही नसते.


इमॅक्युलीच्या आई-वडिलांनी खरं तर त्याआधीही वांशिक विद्वेषाशी सामना केलेला असतो.त्यांच्या डोळ्यांसमोरच रवांडात अनेक उलथापालथी सुरू असतात.जर्मन अधिपत्याखाली येण्याआधी रवांडामध्ये अल्पसंख्य तुत्सींची राजवट असते.त्यामुळे अर्थातच बहुसंख्य हुतूंना दुय्यम नागरिकत्व स्वीकारावं लागलेलं असतं.जर्मन आणि नंतर बेल्जियन या दोन्ही परकीय सत्ता तुत्सी आणि हुतूंमधील संघर्ष धुमसत ठेवतात. १९५९ मध्ये बेल्जियन स्वदेशी परततात तेव्हा तुत्सींची राजवट उलथवून हुतू स्वतःचं सरकार स्थापन करतात. तुर्सीविरोधी हिंसाचाराची लाट उसळते.

त्याचा फटका इमॅक्युलीच्या आई-वडिलांनाही बसतो.पुढे १९७३ मध्ये रवांडाच्या लष्करप्रमुखांनी सत्ता हस्तगत केल्यावर देशभर हिंसाचार उफाळून येतो.त्यात तर इमॅक्युलीचं घर जाळलं जातं.

सुदैवाने हे कुटुंब एका हुतू मित्राच्या घरी लपून राहतं आणि वातावरण निवळल्यावर पुन्हा त्याच ठिकाणी घर बांधून राहू लागतं.या घटनेवेळी 


इमॅक्युली तीन वर्षांची असते.ती लिहिते,'त्या प्रसंगानंतर कधीही आई-वडिलांनी आमच्यासमोर त्या घटनेचा विषय काढला नाही की हुतूंविरोधात ते काही बोलले नाहीत.जणू ती आग म्हणजे चुकून झालेला अपघातच होता.त्यांच्या मते हुतू आणि तुत्सींमध्ये भेदभाव आणि द्वेष असण्याचं काहीही कारण नव्हतं.त्यामुळे माझे अनेक मित्र-मैत्रिणी,शेजारी हुतू होते आणि त्यांच्यासोबतच मी मोठी होत होते.'


पण इमॅक्युलीच्या आई-वडिलांनी कितीही रोखून धरलं तरी हे विद्वेषाचं लोण त्यांच्या मुलांपर्यंत पोहोचायला वेळ लागत नाही.तो द्वेष दैनंदिन आयुष्यात दिसत नसतो.वरवर सगळं शांत असतं.हुतू आणि तुत्सी एकत्र वावरत असतात,पण..इमॅक्युलीला त्याचा पहिला फटका बसतो तो तिचं शालेय शिक्षण पूर्ण होताना.


इमॅक्युली अतिशय हुशार असते आणि अभ्यासूही. त्यामुळे शालान्त परीक्षेत उत्तम गुण मिळवून चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेशासाठी आपण सरकारी स्कॉलरशिप पटकावणार याची तिला खात्री असते.त्या काळी रवांडामध्ये खासगी शाळा भयकंर महाग असतात आणि त्यांचा दर्जाही वाईट असतो.दुसरीकडे, सरकारी कॉलेजमध्ये निवासी प्रवेशासाठी निवड होणं गरजेचं असतं;पण केवळ तुत्सी असल्यामुळे वर्गात दुसरा क्रमांक येऊनही इमॅक्युलीला सरकारी कॉलेजमध्ये प्रवेश मिळत नाही.तिच्या वडिलांना घरच्या गाई विकून तिच्यासाठी खासगी कॉलेजमध्ये प्रवेश घ्यावा लागतो.ती दोन वर्ष इमॅक्युली कशीबशी त्या कॉलेजमध्ये काढते;पण नशिबाने पुन्हा एकदा सरकारी परीक्षेला बसण्याची संधी तिला मिळते आणि त्यात उत्तीर्ण होऊन तिला हव्या त्या कॉलेजमध्ये प्रवेशही मिळतो.आई-वडिलांच्या समजुतीवर शिक्कामोर्तब होतं. तुत्सी आणि हुतू हे भेदाभेद खरे नाहीत.दिवस पालटताहेत.आता वांशिक हिंसाचार मागे पडणार आहे..पण लवकरच वातावरण पुन्हा पालटतं. 


१९५९ च्या सत्तापालटावेळी युगांडामध्ये आश्रय घेतलेल्या तुत्सी नागरिकांनी रवांडन पॅट्रिऑटिक फ्रंट (आरपीएफ) नावाचं दल स्थापन केलेलं असतं.हे दल सैन्याची जुळवाजुळव करून सीमेपाशी हल्ल्याची तयारी सुरू करतं तशी देशात अशांतता पसरते.हुतू पुन्हा एकदा तुत्सींकडे संशयाने बघू लागतात. पॅट्रिऑटिक फ्रंटने हल्ला केल्यावर तुत्सी सैनिक आणि नागरिक हुतूंना मारून टाकणार अशी भीती पसरू लागते-मुद्दाम पसरवलीही जाऊ लागते.रवांडातल्या हुतू सरकारचा अशा अफवांना पाठिंबाच असतो.एवढंच नव्हे,तर सरकारच्या आशीर्वादाने 'इंटरहामवे' हे समांतर सैन्यदल स्थापन होतं आणि तुत्सींविरोधी कारवायांना सुरुवात होते.विशेषतः देशाच्या उत्तर भागात,जिथे हुतूंचं बहुमत असतं,तिथे हा गट विशेष कार्यरत असतो.किरकोळ कारणांवरून तुत्सींवर हल्ले आणि तुत्सी मुली-बायकांवर बलात्काराचं सत्र सुरू होतं.१९९० मध्ये युद्धाला तोंड फुटतं. 


रवांडन पॅट्रिऑटिक फ्रंट युगांडाच्या बाजूने देशावर हल्ला चढवतं.

देशातलं सरकार उलथवून टाकण्यासाठी आणि हुतूंचा नायनाट करण्यासाठीच तुत्सी बंडखोर येत असल्याचं हुतूंचं म्हणणं असतं,

तर सरकार उलथवणं हा हेतू नसून या निर्वासितांना पुन्हा मायदेशी परतायचं आहे,असा तुत्सींचा युक्तिवाद असतो.


दोन्ही गोष्टी आपापल्या जागी खऱ्याच असतात;आणि त्याहूनही खरं असतं ते देशभर पसरलेल्या हिंसाचाराचं आणि एकमेकांबद्दलच्या अविश्वासाचं वास्तव.या काळात इमॅक्युलीच्या वडिलांना तुत्सी बंडखोरांना छुपी मदत करत असल्याचा आरोप ठेवून अटक होते.त्यांचा हुतू मित्रच ही अटक घडवून आणतो. पुढे थोड्याच दिवसांत ते सुटतात; पण त्यानंतरही त्यांचा 'हुतू-तुत्सी भाई-भाई'चा नारा संपत नाही.पण अशा घडामोडींमुळे देशातली शांतता ढळते ती ढळतेच.


तिचा कडेलोट होतो १९९४ च्या एप्रिल महिन्यात. चोवीस वर्षांची इमॅक्युली त्या वेळी सुटीसाठी घरी आलेली असते.तिचा सर्वांत थोरला भाऊ उच्च शिक्षणासाठी परदेशी असतो पण बाकी सगळं कुटुंब मात्र घरीच असतं.इमॅक्युलीचे दोन्ही भाऊही सुटीसाठी घरी आलेले असतात.देशात अराजक माजलं असलं तरी इमॅक्युलीचे वडील मात्र आश्वस्त असतात.


एके दिवशी इमॅक्युलीचा भाऊ डॅमसीन घाबराघुबरा होऊन घरी येतो आणि वडिलांना सांगतो, की 'आपल्या गावातले हुतू हल्ल्याच्या तयारीत आहेत. त्यांच्याकडे तातडीने खात्मा करण्यासाठीची यादी आहे आणि त्यात आपली नावं आहेत.

त्यामुळे आज रात्रीच आपल्याला इथून पळ काढायला पाहिजे.' इमॅक्युलीचं घर देशाच्या पश्चिम टोकाला किवू सरोवराच्या काठाशी असतं. बोटीतून हे सरोवर पार केलं की पल्याडच्या काठावर असतो झैरे (सध्याचा डेमॉक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो) हा देश.रात्रीतून आपण बोटीने झैरेला जाऊ, अन्यथा आपण मारले जाऊ,असं डॅमसीनचं म्हणणं असतं.पण इतक्या अटीतटीच्या क्षणीही त्यांच्या वडिलांना वंशविद्वेषाची चाहूल लागत नाही,किंवा लागूनही त्यांचं उदारमतवादी मन ते मान्य करत नाही.'असल्या अफवांवर विश्वास ठेवून मी माझं घर,माझं गाव सोडून पळपुट्यासारखा पळणार नाही',असं ते जाहीर करतात आणि सुटकेचा शेवटचा मार्गही खुंटतो.


डॅमसीनने आणलेली बातमी ही अफवा नसल्याचं दुसऱ्याच दिवशी सिद्ध होतं.रात्री रवांडन पॅट्रिऑटिक फ्रंटच्या हल्ल्यात रवांडाचे अध्यक्ष मारले जातात आणि हिंसाचाराला तोंड फुटतं.भल्या पहाटेच गावातली तुत्सी मंडळी घोळक्याने इमॅक्युलीच्या घराकडे चालत येऊ लागलेली त्यांना दिसतात.इमॅक्युलीचे वडील हे त्या भागातले प्रतिष्ठित आणि चळवळे असल्यामुळे त्यांनीच आता आपलं रक्षण करावं,असं त्यांचं म्हणणं असतं. तुत्सींच्या लोंढ्याबरोबच आणखीही काही आवाज इमॅक्युलीच्या कुटुंबाला ऐकू येऊ लागतात.त्या असतात डोळ्यांत रक्त उतरलेल्या 'इंटरहामवे' गटातील हुतूंच्या गर्जना.'हुतू पॉवर' अशा आरोळ्या ठोकत हे गट तुत्सींवर चालून येत असतात.दिवसभरात इमॅक्युलीच्या घराभोवती हजोरी तुत्सींचा जमाव जमा होतो.काही न खाता-पिता मुलाबाळांसकट ते त्या ठिकाणी ठाण मांडून बसतात.मरणासन्न प्राण्याभोवती गिधाडं जमावीत तसे हुतू त्यांना मारण्यासाठी चहुबाजूंनी फिरत असतात;पण तुत्सींची संख्या बरीच असल्यामुळे त्यांच्यावर हल्ला करण्याचा त्यांना धीर होत नाही.ते दृश्य पाहून इमॅक्युलीच्या वडिलांना पहिल्यांदाच वस्तुस्थितीची जाणीव होते;पण तोवर उशीर झालेला असतो एक दिवस आणि एक रात्र पार पडते. तुर्सीमधली तरुण मंडळी हुतूंना रोखण्याचं काम करत असतात;पण हे फार काळ शक्य नाही याची साऱ्यांनाच कल्पना येते.दुसऱ्या दिवशी इमॅक्युलीचा भाऊ आणि आई-वडील तिला जवळ बोलावतात आणि त्यांच्या गावातले पाद्री मुरिन्झी यांच्या घरी जाऊन लपायला सांगतात.त्यांना भीती असते ती तरुण इमॅक्युलीवर बलात्कार होण्याची.इमॅक्युली अर्थातच त्याला तयार होत नाही.जायचं तर आपण सगळ्यांनी,असं तिचं म्हणणं असतं;पण तिचे वडील तिला जवळपास हुकूमच सोडतात,की तिने तातडीने पाद्री मुरिन्झींच्या घरी जावं. हे पाद्री हुतू असले तरी ते उदारमतवादी असतात आणि इमॅक्युलीच्या वडिलांचे मित्रही.वडिलांच्या विरोधात बोलण्याची सवय नसल्याने इमॅक्युली सापडतील ते कपडे एका छोट्या सॅकमध्ये भरून मुरिन्झींच्या घरी जायला निघते.तिच्या सोबत असतो त्यांच्याकडे सुटीसाठी आलेला तिच्या धाकट्या भावाचा हुतू मित्र.(मृत्यू पाहिलेली माणसं,गौरी कानिटकर,समकालीन प्रकाशन,पुणे) हे सगळं इतक्या झपाट्याने घडतं की आपण एखादं दुःस्वप्न तर पाहत नाही ना,असं इमॅक्युलीला वाटत असतं;पण चहुबाजूंनी ऐकू येणारा 'हुतू पॉवर'चा उन्माद तिला घडतंय ते सत्य असल्याची जाणीव करून देत असतो.आपण पाद्रींच्या घरी तरी सुखरूप पोहोचू की नाही अशी शंका तिला येऊ लागते.तसा धोका येतोच. अचानक हुतूंची एक टोळी हातांत कोयते घेऊन समोर येते.ती सारी पोरं इमॅक्युलीच्या गावात राहणारी,तिची तिच्या भावांची मित्रमंडळी असतात;पण आता त्यांच्या डोळ्यांतली ओळख पार पुसली जाऊन तिथे फक्त खून चढलेला तिला दिसतो.

आता आपण संपलो,असं वाटत असतानाच त्यांच्यातलाच एक मित्र समोर येतो आणि म्हणतो, "इमॅक्युली,तू इथे काय करते आहेस ? तुला दिसत नाही का इथे सगळ्यांची डोकी फिरली आहेत?" तो मित्र इतरांना तिला मारण्यापासून परावृत्त करतो आणि टोळीला पुढे पिटाळून घेऊन जातो.


राहिलेला शिल्लक भाग…पुढील लेखामध्ये…!!





८/२/२६

चॅन्सेलर विस्मार्क Chancellor Wismarck

मॅझिनी व मार्क्स जगाची पुनर्रचना न्यायाच्या पायावर करण्यासाठी खटपट करीत असता जुन्या संप्रदायाचे राजकारणी व मुत्सद्दी आपापले राज्यकारभार स्वार्थाच्याच पायावर चालवत होते.ते मॅकिऑव्हिलियन तत्त्वावर निष्ठा ठेवून वागत होते.एकमेकांचे प्रदेश लुबाडू इच्छित होते.मुत्सद्देगिरीच्या फसवाफसवीने ते हळूच मुलूख चोरीत व मुत्सद्देगिरीने जमले नाही व फौजा तयार ठेवीत. ( प्रशियाचा प्रतिगामी चॅन्सेलर विस्मार्क,मानवजातीची कथा,हेन्री थॉमस,अनुवाद - सानेगुरुजी,मधुश्री पब्लिकेशन )


प्रिन्स ऑटो व्हॉन विस्मार्क हा एकोणिसाव्या शतकातील अत्यंत प्रतिगामी,फसवा व दुष्ट मुत्सद्दी होता.त्याची मूठ लोखंडाची होती.तो बळाचा उपासक होता.स्वतःच्या महत्त्वाकांक्षेच्या क्षितीजापलीकडे तो पाहत असे.तो म्हणे, "राजकारणात आपला फायदा असल्याशिवाय केवळ शेजाऱ्यासाठी आपण काही करीत नसतो." त्याने जर्मनीचे एकीकरण करून प्रशियन सम्राटाच्या सत्तेखाली जर्मनी देश दिला. विस्मार्कने लष्करी शक्ती उभारून कित्येक पिढ्यांची संस्कृती रक्ताच्या वादळात नष्ट केली.

वस्तुतः तो सतराव्या शतकात शोभणारा मुत्सही होता, पण तो चुकून एकोणिसाव्या शतकात जन्माला आला.


त्याचा बाप प्रशियन सैन्यातील रिटायर्ड कॅप्टन होता. शोनॉसेन येथे त्याची इस्टेट होती.तिची व्यवस्था बापाच्या मरणानंतर विस्मार्क स्वतः पाहू लागला. वयाच्या बत्तीसाव्या वर्षी म्हणजे १८४७ साली प्रशियातील पहिल्या असेंब्लीच्या निवडणुकीत तो स्वतःच्या जिल्ह्यातर्फे निवडून गेला.या काळात प्रगतीपर वारे सुटले होतेपण बिस्मार्कने असेंब्लीकडे केलेली सारी भाषणे प्रतिगामी होती.तो अनियंत्रित राजसत्तेच्या दैवी हक्कांचे समर्थन करीत होता.ख्रिश्चन स्टेटचे समर्थन करीत होता.त्या वेळी फ्रेडरिक वुइल्यम हा राजा होता. त्याचे लक्ष विस्मार्ककडे गेले व त्याने त्याला आपल्या नोकरीत घेतले.


१८४८मधले क्रांतिकारक बंड मोडणे हे त्याचे पहिले अधिकृत काम होय.पण या क्रांतीमुळे एक गोष्ट मात्र झाली व तिच्यासाठी तरी विस्मार्कने या क्रांतीस कृतज्ञ राहणे जरूर होते.ती म्हणजे ही की,या वेळेस जर्मनीचे राजकीय नसले तरी निदान आर्थिक एकीकरण झाले. वेल्स म्हणतो,जर्मनीचे भाग विस्कळीत होते.

हाताच्या पंजाची बोटे असतात,तशी जर्मन स्टेट्स होती. 


विस्मार्कने त्यांची एकजूट करून एकमूठ केली व ती मूठ वळून इतर देशांच्या तोंडावर ठोसे देण्यास विस्मार्क उभा राहिला.जर्मनीचे साम्राज्य निर्मावयासाठी त्याने जाणूनबुजून पद्धतशीर कारवाया सुरू केल्या.त्याला जर्मन साम्राज्यासाठी वाव पाहिजे होता.अगर त्याच्याच शब्दांत सांगायचे तर सूर्यप्रकाशातील महत्त्वाची जागा त्याला हवी होती.अर्थात,उष्ण कटिबंधातील वसाहती वगैरे पाहिजे होत्या.प्रशियाचा राजा जगातील सर्वश्रेष्ठ, सर्वसामर्थ्यसंपन्न व केवळ अनियंत्रित सर्वसत्ताधीश व्हावा,अशी त्याची मनीषा होती.


प्रथम आसपासचे लहान-लहान विस्कळीत प्रदेश घेऊन ते तो खुशाल आपल्या राज्यास जोडीत चालला. जर्मनीच्या उत्तरेस श्लेज्विग व होल्स्टेन हे प्रांत होते. या दोन प्रदेशांतील लोकवस्ती अंशतः डॅनिश व अंशतः जर्मन होती.या दोन्ही प्रदेशांवर डेन्मार्कच्या राजाची सत्ता होती.पण प्रशियाच्याच राजाची हुकमत या भागावर असली पाहिजे,असे विस्मार्कने ठरवले व तो डेन्मार्कशी युद्ध करावयास उभा राहिला.ऑस्ट्रियाचा सम्राटच अद्यापि संयुक्त जर्मनीचा अधिराजा मानला जात असे.श्लेज्विग व होल्स्टेन हे आपले गेलेले प्रांत परत मिळवण्यासाठी ऑस्ट्रियाची मदत घेऊन त्याने युद्ध पुकारले.ऑस्ट्रिया व प्रशिया यांच्या संयुक्त सेना डॅनिश हद्दीत शिरल्या.डॅनिश लोकांनी फ्रान्सचा राजा तिसरा नेपोलियन याच्याशी करार करण्याचा प्रयत्न केला.पण नेपोलियन निराळ्याच उद्योगात होता. 


अमेरिकेत या वेळी चाललेल्या यादवी युद्धात तो आपली बोटे घुसवू पाहत होता.अमेरिकेतील रिपब्लिकच्या जागी तो पुन्हा पूर्वीचे जुने फ्रेंच साम्राज्य स्थापू पाहत होता.त्याने आपले सैन्य व्हेरा क्रूझ येथे पाठवले.मेक्सिकन लोकांना तो ऑस्ट्रियन राजा नकोच होता.त्याला गोळी घालून ठार मारण्यात आले.तिसरा नेपोलियन युरोपियन शेजाऱ्यांच्या घाणेरड्या भांडणात हात घालण्याला पुन्हा मोकळा झाला.


पण या वेळेपावेतो,जर्मन व ऑस्ट्रियन फौजांनी डेन्मार्कच्या राजाजवळून श्लेज्विंग व होल्स्टेन प्रांत घेतले होते.ते दोन्ही प्रदेश जर्मनी व ऑस्ट्रिया यांच्या संयुक्त मालकीचे होते.पण ही मिळालेली सारी लूट केवळ जर्मनीसाठी राहावी अशी विस्मार्कची इच्छा होती.तसेच त्याला ऑस्ट्रियाचे अधिराज्यत्व नष्ट करून स्वतंत्र जर्मन साम्राज्य स्थापावयाचे होते म्हणून त्याने ऑस्ट्रियाशी काहीतरी भांडण उकरून काढले व संरक्षक युद्ध पुकारले.

वास्तविक प्रत्येक युद्ध दोन्ही बाजूंच्या भाडोत्री प्रचारकांकडून संरक्षकच दाखवण्यात येत असते.ऑस्ट्रियाचे सैन्य दोन शत्रू देशात कोंडण्यासाठी विस्मार्कने इटलीशी करार केला व मुत्सद्देगिरीने युरोपातील इतर राष्ट्रांस त्याने तटस्थ ठेवले. त्यासाठी त्याने कोणाला खोटी वचने दिली.कोणाला खोटे सांगितले,

कोणाची खुशामत केली,कोणाला दमदाटी केली,कोणाला धाक घातला आणि आपले व आपल्या राजाचे हित साधण्यासाठी मॅकिऑव्हिलियन कोडातील प्रत्येक मार्गाचा अवलंब केला.


ऑस्ट्रियाविरुद्ध पुकारलेले हे युद्ध पटकन संपले.दोनच महिन्यात प्रशियन फौजांनी ऑस्ट्रियन सैन्यास खडे चारले.ऑस्ट्रियाचा पूर्ण मोड झाला व युरोपच्या घोड्यावर विस्मार्क आरूढ झाला.त्याने उत्तर जर्मनीतील संस्थानांचे फेडरेशन करून ते प्रशियाच्या अधिराज्यत्वाखाली आणले.एवढे केल्यानंतर तो आपल्या चढाऊ धोरणाचे पुढचे पाऊल टाकावयास निघाला.प्रशियातील लष्करी अधिकारी  धर्माधिकाऱ्यांप्रमाणे सन्मानिले जाऊ लागले. विस्मार्कच्या संतत शस्त्रघाताने व त्याच्या अहर्निश चळवळीने जर्मनीभर लष्करामध्ये नोकरी करणे हे केवळ देशभक्तीचे नव्हे;तर पवित्र व धार्मिक कर्तव्य मानले जाऊ लागले. 


प्रशियन सेनापती व्हाँ मोल्टके हा विस्मार्कच्या हाताखाली होता.त्याने स्वतःच्या देशबांधवांना व इतर राष्ट्रांनाही शिकवले,की 'युद्ध ही जगाच्या रचेनेत ईश्वरनिर्दिष्ट अशी एक आवश्यक बाब आहे.' या वेळचे विस्मार्कचे चित्र पाहा.डोक्यावर मध्ययुगीन शिरस्त्राण, निष्ठुर दिसणारे डोळे,जाड पापण्या,जबड्याची मोठी हाडे,मोठ्या लष्करी मिशा यांमुळे तो जनू प्राचीन काळातला युद्धदेवच दिसतो! तो सर्वत्र लाल रक्ताळ मुठीचा कारभार सूरू करू पाहत होता.नवे जर्मन साम्राज्य नीट सुसंघटित व बलिष्ठ करण्यसाठी व वाढविण्यासाठी विस्मार्कने फ्रान्सची कुरापत काढली.पण एकटा विस्मार्कच युद्धप्रिय होता असे नव्हे, तर तिसऱ्या नेपोलियनलाही युद्धाची खुमखुमी होतीच,भांडणाला नेहमी दोघांची जरूरी असते.जर्मनीच्या वाढत्या शक्तीचा नेपोलियनला मत्सर वाटत होता.जर्मनीला चिरडून टाकणारा घाव घालावा अशी संधी नेपोलियन पाहत होता.त्याला विस्मार्कने संधी दिली व नेपोलियनने खरोखरच चिरडणारा घाव घातला.पण तो जर्मनीवर न पडता फ्रान्सवरच पडला व फ्रान्स कोलमडला.जर्मनी व फ्रान्स यांच्यात आर्थिक तशीच राजकीय स्पर्धा सुरू होती व युद्धाचे हेच मुख्य कारण होते.एक क्षुद्र असे तात्कालिक कारणही होते;पण तात्कालिक कारणे ही नेहमीच निमित्ते असतात.चढाऊ राष्ट्र पूर्ण तयारी करून युद्धास सज्ज झाले की ते युद्धासाठी काहीतरी निमित्त शोधीतच असते.


१८७० साली स्पॅनिश लोकांनी आपल्या व्यभिचारी राणीला हद्दपार करून लिओपोल्डला गादी दिली.लिओपोल्ड हा जर्मन राजाचा चुलतभाऊ होता.नेपोलियनला काही तरी कलहकारण हवेच होते.लिओपोल्ड स्पेनच्या गादीचा वारस व्हावा ही गोष्ट नेपोलियनला मान्य नव्हती. विस्मार्क युद्धोत्सुक होताच,तो म्हणाला, "लिओपोल्ड हाच योग्य वारस आहे." नेपोलियनने जर्मनीचा राजा वुईल्यम याला लिओपोल्डची वारसदारी रद्द करण्यास सांगितले तर विस्मार्कने "शक्य ते सर्व करून लिओपोल्ड राजा निवडला जाईल असे करा." असे आपल्या राजाला सांगितले.


जर्मनीचा राजा फारसा युद्धोत्सुक नव्हता.तो नेपोलियन व विस्मार्क या दोघांनाही संतुष्ट ठेवू पाहत होता. खाजगी रीतीने त्याने लिओपोल्डला स्पॅनिश गादीसाठी उमेदवार म्हणून उभे न राहण्यास सांगितले.पण त्याने जाहीररीत्या मात्र त्याच्यावर कोणत्याही रीतीने वजन आणले नाही.येथवर जर्मन राजा व फ्रेंच सम्राट दोघेही अत्यंत सभ्यतेने वागले.पण आता वीस्मार्कने सूत्रे हाती घेऊन युद्ध भडकेल असे केले.नेपोलियनच्या एका सभ्य पुत्राला वुइल्यम राजाने एक सभ्य भाषेतील उत्तर तयार करून ते त्याला देण्यासाठी विस्मार्ककडे धाडले. या वेळी विस्मार्क एम्स येथे औषधोपचार घेत होता.म्हणून ते उत्तर त्याने विस्मार्ककडे तारेने पाठवले होते.


पण विस्मार्कने त्यातील काही शब्द गाळून ते उत्तर अशा स्वरूपात प्रसिद्ध केले की,फ्रेंचांना जर्मन व जर्मनांना फ्रेंच डाकू वाटावेत.विस्मार्कचा हेतू सफल झाला व फ्रेंचांचे आणि जर्मनीचे युद्ध जुंपले.ते वस्तुतः अनावश्यक व संपूर्ण मूर्खपणाचे युद्ध होते. त्यात फ्रेंचांचा मोड झाला व नेपोलियन पदच्युत झाला.दोहो बाजूंचे हजारो लोक ठार झाले.फ्रेंचांनी रिपब्लिक जाहीर केले.विस्मार्कचा जय झाला.


उत्तरेकडची व दक्षिणेकडची संस्थाने एक करून जर्मन साम्राज्य स्थापण्यात आले.इल्यम राजा पहिला केसर (सीझर) वइल्यम झाला.विस्मार्कचे घोडे गंगेत न्हाले. त्याची कीर्ती शिगेला पोहोचली.त्याचे मनोरथ पूर्ण झाले. त्याच्या वैभवावर कळस चढला.फ्रान्सचे अल्सेस व लॉरेन हे प्रांत बळकावण्यात आले व १९१४च्या महायुद्धाचे बीजारोपण करण्यात आले. १८७०च्या द्वेषात व १८७१च्या तहात १९१४च्या महायुद्धाची बीजे होती.युरोपचे प्रभुत्व लाभल्यावर विस्मार्क वसाहतींकडे वळला.'वसाहतींचा विस्तार' या नवीन रूढ झालेल्या शब्दांचा अर्थ असा की, 'आशिया व आफ्रिका या खंडांतील दुबळ्या देशांना प्रबळ युरोपियन राष्ट्रांनी गुलाम करणे.पौर्वात्यांच्या या लुटमारीची विस्मार्कला - त्या लुटीच्या पुरस्कर्त्याला बिलकुल दिक्कत वाटत नसे. साऱ्या हयातीत त्याने आपले कुटुंब व आपला राजा यांपलीकडे कोणालाही व कधीही सहानुभूती दाखवली नाही.इंग्लिश ज्ञानकोशात प्रो.एरिक बँडेनवर्ग लिहितो,'मानवजातीसाठी विस्मार्कला काहीही वाटत नसे.' त्याला नैतिकदृष्ट मुळी नव्हतीच.स्वतःच्या वैयक्तिक महत्त्वाकांक्षेच्या पूर्ततेसाठी मानवांना तो प्यादी समजत असे. स्वतःचे हेतू पूर्ण करून घेण्यासाठी तो मानवांच्या आशांची राखरांगोळी करी.त्यांच्या प्राणांचे हत्याकांड मांडी. पण विस्मार्कने आपली कीर्ती पाहिली, तशीच ती नष्ट झालेलीही पाहण्याचे त्याच्या कपाळी आले! कैंसर दुसरा वुइल्यम याने राजा होताच विस्मार्कला रजा दिली.आपण त्या लोखंडी,पोलादी मदतीशिवायही मानवजातीची नीट लूटमार करण्यात समर्थ आहोत,असा आत्मविश्वास या नवीन तरुण राजाला वाटत असे.


एखाद्या जुनाट हत्याराप्रमाणे विस्मार्कला फेकून देण्यात आल्यामुळे तो सम्राटाविरुद्ध जाफळत होता व आपल्या दुर्दैवाला दोष देत होता.पण त्याचा क्रोध कर्मशून्य व विफल होता. २८ जुलै १८९८ रोजी मृत्यू येईतो तो गंजलेल्या हत्याराप्रमाणे पडून राहिला.

त्याला ब्याऐंशी वर्षे आयुष्य लाभले. रक्ताच्या पायावर त्याने जर्मन साम्राज्याची उभारणी केली.पण हे सामर्थ्यसंपन्न साम्राज्य पन्नासच वर्षांत पुन्हा रक्तसागरात बुडून गेले. तो अद्वितीय मुत्सद्दी होता;पण मुत्सद्देगिरीतील अगदी प्राथमिक धडाही तो शिकला नव्हता.

हा.धडा कोणता? युद्धप्रिय बनून जग जिंकण्यास निघणे,म्हणजे साम्राज्याच्या विनाशाचा खात्रीचा मार्ग.


हा लेख समाप्त…!!


६/२/२६

५.६ पेशीचक्र / 5.6 Muscle Cycle

प्रत्येक पेशी ही आपल्या आयुष्यात अनेकदा विभाजित होते.पण विभाजित होण्याव्यतिरिक्त इतर वेळी विभाजित होण्यासाठी ती तयारी करत असते. या दोन्ही गोष्टींना मिळून 'सेल सायकल' म्हणतात.


हे म्हणजे एखाद्या कॅन्टीनमध्ये रोज जर १०० प्लेट पदार्थ तयार करून विकावा लागत असेल तर तिथे काम करणारे लोक जसे आदल्या दिवशी किराणा आणि भाजो खरेदी करून आणतील,

संध्याकाळी भाजी निवडून,चिरून ठेवतील आणि सकाळी तो पदार्थ ५ मिनिटांत तयार होईल इतपत तयारी करून ठेवतील आणि आणि कॅन्टीनमध्ये प्रत्यक्ष पाहुणे येऊन त्यांनी ऑर्डर दिल्यानंतर लगबगीनं तो पदार्थ तयार करून, डिशमध्ये घालून तो त्यांना वाढला जाईल.खरं तर बाहेरून हे सगळं बघणाऱ्याला असं वाटेल की कॅन्टीनमधले आचारी तर लोक खायला आल्यावर तो पदार्थ तयार करताहेत,मग इतर वेळी ते बसून राहतात का? तर इतर वेळीही ते काम करत असतात,पण त्यातून प्रत्यक्ष उत्पन्न किंवा परिणाम मात्र काहीच दिसत नाही. पण ही तयारी दुसऱ्या दिवशी उत्पादन देण्यासाठी गरजेची असतेच.शिवाय मध्ये मध्ये योग्य तो किराणा आणि योग्य त्या प्रमाणात आणलाय का? शिवाय, मसाला योग्य प्रकारे तयार झालाय का? आणि आता व्यवस्थित पदार्थ तयार होऊ शकतो का? हे त्या कँटिनचे मॅनेजर किंवा मालक मध्ये मध्ये येऊन पाहून जातच असतात. हे सगळं अगदी सेल सायकलसारखंच चाललेलं असतं!


सर्वसाधारण मानवी पेशी दर २४ तासांनी एकदा विभाजित होते.त्यापूर्वी ती GI (गॅप१), S (सिंथेटिक), G2 (गॅप २) आणि M (मायटॉटिक) चार फेजेसमधून (टप्प्यांतून) जाते. पण एकोणिसाव्या शतकापर्यंत मायक्रोस्कोपमधून बघताना तर फक्त पेशी विभाजित होतानाच दिसत होती.पेशी ही प्रत्यक्ष विभाजनापूर्वी या चार टप्प्यांतून जाते याचा शोध वैज्ञानिकांना नंतर लागला.खरं तर सेल सायकल या प्रक्रियेत खूप लहान लहान गोष्टी माणसाला हळूहळू कळत गेल्या आणि हे शोध कोणा एका माणसानं लावले नाहीत तर अनेकांच्या संशोधनाचं ते एकत्र फलित आहे. पेशीच्या वाढीसाठी आणि प्रजननासाठी सेल सायकल ही प्रक्रिया गरजेची असते.


त्यामुळेच कोणत्याही सजीवाची वाढ होत असते.सेल सायकलमधला महत्त्वाचा भाग म्हणजे ऽ फेज. या फेजमध्ये पेशीतल्या DNA चं आणि क्रोमोसोम्सचं रेप्लिकेशन.म्हणजे आणखी एक प्रत तयार केली जाते. कोणत्याही सजीवाच्या शरीरात सेल सायकल सुरळीत चालत असतील तर त्या सजीवाची वाढ आणि जीवन योग्य प्रकारे होत राहतं.पण जर ही सेल सायकल नीट चालली नाही तर आनुवंशिक विकार किंवा कॅन्सरसारखे असाध्य आजार होऊ शकतात.


सर्वसाधारणपणे सेल सायकलमधल्या M फेजमध्ये मायटॉसिस प्रकारचं (सूत्री विभाजन) पेशी विभाजन होत असते.तर सेक्सपेशींमध्ये मियॉसिस (अर्धसूत्री) प्रकारचे पेशी विभाजन होते.मियॉसिसमध्ये क्रोमोसोम्सची संख्या निम्मी होते.त्यातून गॅमेट्स म्हणजे बीजांडपेशी किंवा शुक्रपेशी तयार होतात.यातून पुढे मग स्पर्मपेशी आणि बीजांडपेशी एकत्र येऊन त्यांतले वेगवेगळे क्रोमोसोम्स एकत्र येतात आणि त्यातूनच उत्क्रांतीसाठी आवश्यक असलेली वैविध्ये (व्हेरिएशन्स) घडून येऊ शकतात.या सगळ्यासाठी सेल सायकल ही सगळ्याच सजीवांच्या सजीवक्रियांसाठी आणि त्या सजीवाची जात टिकवण्यासाठी गरजेची आणि महत्त्वाची आहे.


पण मुळात सेल सायकल ही गोष्ट अस्तित्वात असते हे माणसाला कसं कळलं? सेल सायकलच्या शोधाच्या गोष्टीची सुरुवात ही पेशी विभाजनाच्या शोधापासूनच सुरू होते. एकोणिसाव्या शतकाच्या मध्यात पेशीची संकल्पना आली होती.पण त्यावेळी पेशी प्रजनन किंवा विभाजन कसं करतात हे माहीत नव्हतं.त्यातच श्वान आणि श्लायडेन यांनी कोणतीही पेशी ही पूर्वी अस्तित्वात असलेल्या पेशीतूनच जन्म घेते आणि पेशी हे सजीवांच्या अस्तित्वाचं एकक आहे हे सेल थिअरीतून सांगितलं.


नागेली आणि रेमाक (Nageli and Remak) यांनी वनस्पती आणि प्राणी यांच्यामध्ये पेशी विभाजन कसं होतं यावर संशोधन करून व्यवस्थित वर्णन केल्यानंतर खरं म्हणजे आपल्याला पेशी विभाजन कसं होतं ते कळायला लागलं.त्यानंतर व्हर्च या वैज्ञानिकानं पेशी या फिशन पद्धतीनं विभाजित होत असाव्यात असंही सांगितलं.साधारणपणे त्याच काळात कोलिकर (Kolliker) यानं गर्भाच्या पेशींचा अभ्यास केल्यानंतर पेशी विभाजित होण्यापूर्वी तिच्यावर क्लिव्हेज (फट) दिसते असे दाखवून दिलं.थोडक्यात, क्लिव्हेज ही पुढे होणाऱ्या पेशी विभाजनाची पूर्वसूचनाच म्हटली पाहिजे. यावर पुढे १८७० ते १८८० मध्ये प्रिंगशेईम,स्ट्रासबर्गर आणि हटीवग (Pringsheim, Strasburger and Hertwig) यांनी काम केलं.त्यांच्या संशोधनातूर असं कळलं की स्पर्म (शुक्रजंतू) आणि एग (बीजांड) या दोन वेगवेगळया पेशी असून त्यांच्या एकत्र येण्यातून बीजांडाचं फलन होतं.आणी पुन्हा चक्क एकपेशीयच झायगोट (युग्मज) तयार होतो. आणि त्यानंतर अनेकदा पेशी विभाजन होत होत त्या प्राण्याचो वाढ होते.यातून त्यांच्या असं लक्षात आलं,की प्रत्येक बहुपेशीय प्राण्यांच्या जीवनाचो सुरुवात एकाच पेशीतून होते. त्यामुळे पेशी विभाजन हे सगळ्याच सजीवांचं सगळ्यात महत्त्वाचं लक्षण असावं असं आता लक्षात आलं होतं.


त्यानंतरच्या काळात मायक्रोस्कोप्समध्ये आणि इतर तंत्रांमध्ये सुधारणा झाल्या.त्यामुळे मायटॉसिस या सेल सायकलच्या सगळ्यात महत्त्वाच्या पायरीमध्ये क्रोमोसोम्समध्ये काहीतरी बदल होतात हे १८८० च्या दरम्यान वॉल्टर फ्लेमिंग आणि स्ट्रासबर्गर यांच्या लक्षात आलं.पेशी विभाजनाच्या पूर्वी न्यूक्लियसमधले क्रोमोसोम्सचे धागे लांब होतात आणि पेशीमधल्या दोन टोकांकडे जायला लागतात. त्यानंतर मायटॉसिस (पेशी विभाजन) होतं आणि हे धागे पुन्हा आखडले जातात असंही आता समजलं होतं.


यानंतर काहीच काळात फॉन बेनेडन यानं प्रत्येक क्रोमोसोम्सचे दोन अर्धे भाग हे न्यूक्लियसच्या दोन्ही टोकाला जाऊन दोन वेगवेगळ्या न्यूक्लियसमध्ये विभागले जातात,हे दाखवलं.


यानंतर वाइजमननं बेडकांची अंडी आणि स्पर्म्स यांच्यावर एक प्रयोग केला.त्यातून त्यांना प्रत्येक बीजांडाला फलित करायला एक आणि एकच स्पर्म गरजेचा असतो असं लक्षात आलं.बेडकांची अंडी आणि स्पर्म ही दोन्हीही त्यांच्या शरीराबाहेर पाण्यात सोडली जातात.त्यामुळे पाण्यात स्पर्म आणि बीजांडाच्या जास्तीत जास्त जितक्या जोड्या तयार होऊ शकतील तितकेच गर्भ तयार होऊ शकतात,असं या प्रयोगातून लक्षात आलं.या प्रयोगांतून आणि संशोधनातून आता क्रोमोसोम्स हे आनुवंशिकतेचे एकक असतात आणि जर्म सेल म्हणजेच बीजांड आणि स्पर्म हे आनुवंशिकतेचे वाहक असतात हे वाइजमननं ओळखलं होतं.


याच जर्म सेल्स आनुवंशिकता आणि पुढच्या पिढ्या यांच्यातला दुवा असतात.


आता १९००च्या दरम्यान मेंडेलचे आनुवंशिकतेचे नियम पुन्हा जवळपास चार दशकांनी जगासमोर आले होते. त्यातून आता आनुवंशिकता आणि सेल सायकल यांचा संबंध काय आहे हे ह्यूगो डी व्हॅरिस, कोरेन्स आणि सेमार्क (DeVries, Correns,and Tschermak) यांच्या कामातून समोर आला होता. झायगोटमध्ये कोणत्याही गुणासाठी दोन संच असतात. तर आई आणि वडिलांकडून येणाऱ्या गॅमेटसमध्ये प्रत्येक गुणासाठी एकच संच असतो हे मेंडेलनं सांगितलं होतं.आता गॅमेटसमध्ये असणारे अर्धे कमोसोम्स (हॅप्लॉइड) आणि इतर पेशींमध्ये असणारे संपूर्ण संच (डिप्लॉइड) या आताच्या संशोधनाला पुष्टी देणारेच होते.मॅडेलचे ओबडधोबड वाटणारे नियम खरं तर सेल सायकलच्या वेळी क्रोमोसोम्सच्या विभाजना विषयीच नेमकं भाष्य करत होते ! या सगळ्या गोष्टींवर विसाव्या शतकाच्या पहिल्या दोन दशकांत पुन्हा संशोधन होऊन शिक्कामोर्तब झालं.आणि त्यानंतर फक्त पेशी विभाजन ही प्रक्रिया महत्त्वाची नसून,संपूर्ण सेल सायकलच कोणत्याही सजीवाच्या संपूर्ण वाढ, विकास आणि आनुवंशिकता यांच्यासाठी महत्त्वाची आहे असं लक्षात आलं.


यानंतर सेल सायकलमध्ये चालणाऱ्या घटना का आणि कशा तऱ्हने नियंत्रित होत राहतात या गोष्टी हळूहळू कळायला लागल्या.प्रत्येक पेशीमध्ये न्यूक्लियस आणि सायटोप्लाझम यांच्या आकारमानात एक विशिष्ट प्रमाण असतं आणि हे प्रमाण बदललं की ती पेशी विभाजनाच्या तयारीला लागते असं हर्टविग यानं सांगितलं.या प्रमाणाला त्यानं कॅरिओसायटोप्लाझमिक / न्यूक्लिओसायटोप्लाझमिक रेशो असं म्हटलं.यानंतर लगेचच पेशीच्या पृष्ठभागावर क्लिव्हेज दिसायला लागते.यानंतर सेल सायकल ही आणखी कोणकोणत्या गोष्टींनी नियंत्रित केली जाते त्या गोष्टी विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात समजायला लागल्या.


फेजेस


प्रत्येक युकॅरिऑटिक पेशी ही पेशी विभाजनानं जन्म घेते आणि जेव्हा ती पुन्हा विभाजित होते,तेव्हा तिचं स्वतंत्र अस्तित्व संपून पुन्हा दोन नव्या पेशींना जन्म देते. पेशी विभाजनाच्या या दोन घटनांच्या मध्ये एक संपूर्ण पेशीचक्र घडतं.यालाचा सेल सायकल असं म्हणतात. सेल सायकलमध्ये G1, S, G2 आणि M हे चार टप्पे म्हणजे फेजेस असतात.


पहिल्या गॅप फेजमध्ये (G1) प्रत्येक पेशीचा आकार वाढतो,S फेजमध्ये त्या पेशीतल्या DNAचं रेप्लिकेशन म्हणजेच DNA ची आणखी एक प्रतिकृती तयार केली जाते.दुसऱ्या गॅप फेजमध्ये (G2) सगळा DNA व्यवस्थित कॉपी केलाय का? त्यात काही चुका तर नाही ना झाल्या हे तपासलं जातं.तर M म्हणजेच मायटॉटिक फेजमध्ये नव्यानं तयार झालेल्या दोन न्यूक्लियसमध्ये नव्यानं तयार झालेले क्रोमोसोम्स सारखे वाटले जातात. यातून एक मूळ पेशी ही दोन नव्या पेशींमध्ये विभाजित होते.ही संपूर्ण सायकल काही मिनिटांमध्ये ते काही दिवसांमध्ये घडते.

माणसांमध्ये सेल सायकलचं एक चक्र पूर्ण व्हायला साधारणपणे एक दिवस लागतो. पहिल्या तीन फेजेसना एकत्रितपणे इंटरफेज म्हणतात. आणि याच फेजला सगळ्यात जास्त वेळ लागतो आणि उरलेल्या दुसऱ्या फेजला मायटॉटिक फेज म्हणतात. प्रत्येक सजीवातली प्रत्येक पेशी ही कायम यापैकी कोणत्या तरी एका फेजमध्ये असते.पण गंमत म्हणजे न्यूरॉन्स,

हृदयाच्या पेशी आणि शरीरातल्या आणखी काही पेशी या कधीही सेल सायकलचं एकही चक्र पूर्ण करत नाहीत,त्या कायमच GO या फेजमध्ये थांबलेल्या असतात.याशिवाय एकदा एखाद्या पेशीनं या सेल सायकलमधली एखादी पायरी किंवा टप्पा पार केला तर ती पेशी पुन्हा मागच्या पायरीमध्ये जाऊ शकत नाही, याचाच अर्थ सेल सायकल ही एकाच दिशेनं चाललेली प्रकिया असते.हे रॉबर्ट जॉन्सन यानं १९७० मध्ये शोधून काढलं.


चेक पॉइंट्स


प्रत्येक पेशीमध्ये सेल सायकल नियमितपणे चाललेली असली तरी कॅन्सरच्या पेशीमध्ये हे चक्र विस्कळीत झालेलं असतं.मायक्रोबायॉलॉजिस्ट डोनाल्ड विल्यमसन यानं १९६५ मध्ये DNA वर रेडिओ अ‍ॅक्टिव्ह लेबलिंग केलं.खरं तर त्याला DNAचं रेप्लिकेशन कसं होतं ते पाहायचं होतं.तो यीस्टच्या पेशींवर हे प्रयोग करत होता.हे करत असताना त्याला, बहुपेशीय युकॅरिऑटिक प्राण्यांच्या पेशींमध्ये जशा फेजेस असतात तशाच फेजेस यीस्टमध्येसुद्धा पाहायला मिळाल्या.यावरून त्याला आपल्या शरीरातल्या पेशींच्या सेल सायकलचा अभ्यास करायचा असेल तर आपण यीस्टचा अभ्यास करूनही हे समजून घेऊ शकतो हे लक्षात आलं.त्यानंतर असाच अभ्यास करत असताना हार्टवेलनं अनेक म्यूटंट पेशींमधल्या सेल सायकलचा अभ्यास केला आणि त्यातून सेल सायकल नियंत्रित करणारेही अनेक जीन्स असतात हे शोधलं.अशा जवळपास १२ जीन्सचा त्यानं १९७० च्या दरम्यान शोध लावला. पण त्यातल्या त्यात 'सेल डिव्हिजन सायकल २८' हा जीन फारच मजेशीर होता.त्यालाच मग सीडीसी २८ (CDC28) किंवा स्टार्ट जीन्स असं नाव मिळालं.कारण हाच जीन्स कोणत्याही पेशीनं जी १ फेजमध्ये प्रवेश करून नवी सेल सायकल सुरू करायची की नाही किंवा केव्हा करायची हे ठरवत होता.यातूनच पुढे चेक पॉइंटची संकल्पना आली.


हार्टवेलचा रिसर्च वाचून ब्रिटिश जेनेटिसिस्ट पाऊल नर्स याला यात फारच रस वाटायला लागला.तो मग एडिंबरो विद्यापीठात गेला आणि हे सगळं झूऑलॉजिस्ट मुर्दोच मित्विसन (Murdoch Mitchison) याच्याकडून शिकून घेतलं.मित्विसन यानं यीस्टवर बराच अभ्यास केला होता.आता हे शिकून घेतल्यानंतर नर्सनं यावर चक्क स्वतःच पुढे संशोधन सुरू केलं.त्यानं योस्ट पेशीचे म्यूटेट प्रकार घेतले.हे म्यूटंट असे होते,की ते एका ठरावीक ताप‌मानाला आहेत त्या फेजमध्ये थांबत होते आणि तापमान बदललं की पुन्हा आपली सोल, सायकल चालू करत होते.या प्रकारच्या यीस्ट्सवर अभ्यास करून नर्सनं १९७५ साली सेल सायकल जीर या फेजमध्येच थांबवणाराही एक जीन असतो हे शोधून काढले.त्याला मग CDC2 असं नाव दिलं.या जीन्सच्या नियंत्रणामुळेच कोणतेही सेल्स हे जीर फेजमधून M मध्ये जाऊ शकत होते! म्हणजे हाही एक चेक पॉइंट झाला.


उदाहरणार्थ,एखादी जखम भरून येण्यासाठी आणि वाढीसाठी पेशी विभाजन होत राहते आणि त्वचा जुळून आली की ती थांबते म्हणजेच हाही चेक पॉइंट आहे.पुढे नर्सनं हेच तंत्र वापरून माणसांमधलाही CDC2 जीन शोधून काढला.


….समाप्त…!!

४/२/२६

अशी पाखरे येती /That's what happens

धुक्याचा पुंजका


पावसाळा हा बगळ्यांच्या विणीचा हंगाम.या वेळी श्यामल वर्णाच्या आकाशपटलावरील त्यांचं श्रेणीबद्ध उड्डाण खरोखरीच सृष्टीतील एक अनुपम व मनोहर दृश्य वाटते.या वेळी त्यांच्या पाठी स्फटिकासारख्या पिसाच्या कलाबतूनं सुशोभित होतात.मेघ घुणघुणताहेत,वारा रुणझुणतो आहे आणि पाऊस रिमझिमतो आहे.अशा या भावोद्दीपक संगीताच्या पार्श्वभूमीवर बगळ्याच्या समूहाचं अंतरिक्षात चाललेल्या अनुनयाचं दृश्य तर स्वर्गीय असतं.वाटतं,जणू प्रभामंडल असलेला धुक्याचा विशाल पुंजकाच अंतराळात तरंगतोय.


निळी रेषा


तेजस्वी,निळी विद्युतगतीनं पाचूच्या पानापानांतून जाणारी ती रेषा आता माझ्या पूर्ण परिचयाची झाली होती.

चिमणीएवढं लांब चोचीचं ते पाखरू सांज सकाळ त्या ओढ्या खाडीची परिक्रमा करताना दिसून येई.हे त्याचं अठरा लक्ष योजनेचं उड्डाण पुनर्निर्मितीकरिता होतं.मृदु-मदिर स्वरात आतुरतेनं शीळ घालीत ते घरट्याकडे धाव घेतं.रत्नाचं सौंदर्य त्याला लाभलं होतं. शिलाजित,वैडुर्य,इंद्रनील व नाजूक नेचे या सर्वांच्या रंगांची पखरण विधात्यानं त्याच्या सानुल्या देहावर केली होती.


श्यामल शंख


समोर गवताळ सपाट टापू नजरेत मावत नाही.त्या कुरणातून मध्ये थोडा ओलसर चिखल असलेली व बाजूला वाळलेली अशी पाऊलवाट भांगासारखी शोभते.सात कोकणी लावा हळूहळू त्या पाऊलवाटेनं डौलात हारीनं चालत आहेत.किती देखण्या. गोजिरवाण्या.आकाशात उडत असलेल्या श्येनानं अवचितपणे खाली झेप टाकली.पाचूच्या गवतात त्या थिजल्या.जणू सात चित्रित श्यामल शंखांप्रमाणं त्या सुंदर दिसल्या.


वाक् वाक्


मला जाग आली.समोरील खिडकीच्या नितळ काचा कृष्ण पक्षातील मावळतीकडील चंद्रकलेच्या प्रकाशानं उजळल्या होत्या.अजून उजाडलं नव्हतं.ढोकरीच्या काळ्या सावल्या एकामागून एक खिडकीच्या तावदानावरून तरंगत जाताना दिसत.त्यांच्या वाक्-वाक् ह्या मन विचलित करणाऱ्या चिरपरिचित आवाजानं वातावरणात गूढ रम्यता येते.


इतक्यात आकाशातून एक खपुष्प धरित्रीवर झेपावलं. मला माझ्या आजीची आठवण झाली.हातात कवड्यांची माळ घेऊन निळावंतीची पोथी वाचणारी ! माझ्यावर तिचा फार लोभ.

निळावंतीच्या पोथीतील अनेक रहस्यं ती मला सांगे.मी एकदा तिला विचारलं,


"आजी,हे तुटलेले तारे कोठे ग पडतात?" कितीतरी वेळ ती गप्प बसली.बोलेनाच.


"सांग ना ग!" मी लाडिकपणे तिला विचारलं.


ती बोलली नाहीच. तिनं अंगुलीनं समोरचा जलाशय दाखविला.


जलाशयाचं मला मोठं आकर्षण वाटतं.त्या गूढ रम्य जलाशयाकाठी मी तासन् तास् बसून राही.मोठा झालो. एकदा माझ्या सृष्टिज्ञानी मित्राबरोबर जलाशयाच्या काठावरून फिरताना अद्भुत प्रकारचे पदार्थ पाण्यात तरंगताना दिसले. त्याकडे लक्ष वेधून तो म्हणाला, "ही आकाशातून पडलेली खपुष्पं आहेत. ढोकरी ही खपुष्पं खातात."


मोर शिंगारत राहिला


गौंडी बोलीत कोतवाल पक्ष्याविषयी एक अर्थपूर्ण म्हण आहे. 'मोर शिंगारत राहिला अन् गोचा राजा झाला.' गोचा स्वभावानं खरोखरंच राजा आहे. 'किंग क्रो' हे त्याचं इंग्रजीतील नाव यथोचित आहे. एवढासा जीव पण कित्येकदा मोरघारी, कावळे, घारी, बहिरी ससाणे व श्येन पक्ष्यांना हुसकावून देण्यासाठी त्यांचा पाठलाग करताना मी पाहिले आहे.कसा त्यांच्यावर तुटून पडावयाचा. ते दूर निघून गेल्यावर पुन्हा तो त्या वृक्षावर यायचा. त्या वृक्षावर अनेक भीरू पाखरांनी आश्रय घेऊन घरटी केलेली असायची.


एक-दोन तर कधी चार-पाचाच्या समूहातून ते तळ्याकाठच्या झुडपातून हवेत सूर मारायचे. बाणासारखी त्यांची शेपटी.जणू हवेत काळे बाण सुटत आहेत असे वाटायचे.जलाशयातील लव्हाळ्यावरील कृमि कीटकांचा अलगद वेध घ्यायचे.एकदा तर सोनपाठी सुताराचा पाठलाग करीत त्याच्या चोचीतील चारा त्यानं हिसकावून घेतला.सुतार पक्षी 'किलीलीली' करीत असहायपणे ओरडत राहिला.


झिलाणीवरच्या हिरव्यागार देवधानावर संध्याछाया पडायच्या. बुलबुलाची गोड किलबिल झुडपाझुडपांतून निमून जायची. एखाददुसरी पाणकोंबडी जंगलातून निःस्तब्धपणे उडत झिलाणीवर यायची. तळ्याच्या मुखातून मासे उड्या मारताच चांदीसारख्या त्यांच्या पाठी चमकत असताना डुबकन आवाज होई. धीवरांच्या डोंगी किनाऱ्याकडे झपाट्यानं येताना दिसायच्या. त्यांच्या हातातील लांब काठीनं ते वल्हवीत किनाऱ्याला पोहोचायचे.अशा कातर वेळी गोचा मात्र लव्हाळ्यावर बसून तर कधी उंच आकाशात सूर मारून कृमि-अळीचा वेध घेई. अंधार वाढत राही. त्याच्या काळ्या सावल्या त्यात विरघळून जायच्या.


जलाशयावरील रत्ने


बांधाखालच्या अंगाला असलेल्या पुरातन वृक्षांच्या प्रचंड फांद्या बांधावरून ओणावतात.जलाशयातील पाण्यात पाहतात.त्यांचे वेडेवाकडे अजगरासदृश प्रतिबिंब त्यात तरळताना दिसते.उडत असलेल्या,बसलेल्या स्थितीतील विविध आकारांचे लहान-मोठे किती तरी किलकिले पाहून आश्चर्ययुक्त आनंद वाटे.तेजस्वी काळ्या-पांढऱ्या वर्णाच्या कवडी किलकिल्यांना कृष्ण व श्वेत रत्नांच्या वर्णाची पिसे पांघरून उडताना पाहून ते आकाशगामी जलदेवतेसारखे वाटत.त्यांची काळ्यापोवळ्यासारखी लांब चोच देदीप्यमान वाटे.तेथे काही मोठे किलकिले जोडीने बसले होते.त्यांच्या डोक्यावरील काटेरी काही पिसे शेंडीसारखी उभी होती.पाठीवरची पिसे पांढरी-करडी होती.छातीची पिसे सुंदर तांबडी दिसायची.रान कबुतराएवढ्या आकाराच्या किलकिल्यांच्या चोची चाकूच्या पातीएवढ्या रुंद दिसत. अगदी चिमणीएवढे किलकिले लवचिक नाजूक अशा जलवनस्पतींच्या फांद्या आपल्या प्रवाळ रंगाच्या पायांनी घट्ट धरून बसलेले होते.जलाशयाच्या पृष्ठाला अलगदपणे स्पर्श करीत,देवनळाच्या सळसळीशी स्पर्धा करीत अवर्णनीय अशा त्यांच्या सुंदर निळ्या पाठी चकाकत.वाटे जलाशयावर जणू रत्नेच उधळली आहेत. त्यांच्या रूपाने जणू कुणी देदीप्यमान अशा निळ्या रेघाच जलाशयावर ओढीत असल्याचा भास होई आणि त्या रेषांतून पाण्यातील मासे चांदीसारखे चकाकत.


बेहड्यावरचा खोपा


जलाशयाला लागून झिलाणी व गूढ शांतता नांदत असलेल्या बोडी आहेत.ती बोडी तर देवधानानं झाकून गेली होती.कुठं एखादा निळ्या-हिरव्या पाण्याचा भाग सकाळच्या सूर्यकिरणात आरशासारखा लख्ख दिसायचा.आमच्या चाहुलीनं त्या बोडीतील देवभातात चरत असलेले अडईचे जोडपे भुर्रकन् झप् झप् पंख फडफडवीत सीसिक् सीसिक् आवाज करीत त्या जलाशयातून उंच निळ्या आकाशात उडू लागले. लांब मानेची-भुऱ्या रंगाची ती वन्य बदके या अद्भुत जलाशयावर घिरट्या घालीत उडत होती. बांधावर बेहडा, पिंपळ व मोहा यांचे पुरातन वृक्ष उभे होते. थोड्या वेळानं ती बेहड्याच्या पोखरीत दिसेनाशी झाली. अशा पुरातन वृक्षांच्या पोकळीत त्यांची गूढ घरटी असतात.


सावरीवरल्या वंडकी


समोर स्वयंभू जलाशय आणि त्याला लागून असलेले विशाल झिलाण.काळ्या रंगाची-पंखाला पांढरी किनार असलेल्या वंडकी दूरच्या बोडीवरून शीळ घालीत झिलाणीवर घिरट्या घालू लागल्या.त्या झिलाणीत एक सावरीचा महावृक्ष उभा आहे. तीन-चार वंडकीच्या जोडप्यांनी त्या वृक्षाच्या पोखरीत खोपी केली आहेत.त्या उंच विशाल वृक्षाभोवती काळ्या पांढऱ्या रंगाच्या वंडकी उडताना मोठ्या अद्भुत वाटायच्या. सकाळ-सायंकाळी ती गूढ घरट्याकडे झेप घेताना दिसायची.त्यांची पिलं आता जाणती झाली होती. चोचीत धरून त्या पिलांना घरट्यातून बोडीकडे नेतानाचं दृश्य निसर्गात दुर्मीळ आहे. एक एक पिलू ते त्या देवधानाच्या बोडीत आणून सोडत. नंतर ती नाजूक पिले तिथेच देवधानाचा चारा खाऊन लहानाची मोठी होत.


उत्तुम उत्तुम


सूर्य अस्ताला जाताना तर त्या स्वयंभू जलाशयाचं सौंदर्य अवर्णनीय असे.त्याच्या काठच्या गूढ हिरव्या झिलाणीतील देवभातावर नजर ठरत नसे.अशा वेळी उत्तुम-उत्तुम-उत्तुम असा केम कुकडी-वॉटर कॉकचा आवाज सायंतन शांततेत नादमाधुर्य ओतीत असे. वाटे तो आवाज अगदी जवळून येतोय.परंतु पाण्याच्या माध्यमातून तो आवाज फार दुरून येत असे. एखाद दुसऱ्या वेळी तो आपल्या लांब, लोंबत असलेल्या जड पायांनी थोडा फार गडप होई. त्यांच्या डोक्यावरचा तुरा संधिप्रकाशात उंच उडत लगेच देवभातात गडप सुंदर दिसे.जांभळ्या रंगाची केम आता देवभातात घरटी बांधीत होती.पाण्यावर काड्याकाटकीचे उंच- तरंगणारे ते घरटे असे.यात चार-पाच पांढरी अंडी असायची.केम दिसावयाचे क्वचितच.देवभातातून चालताना देवभाताची हालचाल व्हायची. तीच यांची चाहूल.


बगळे


तळी, झिलाणी,बोडी व तिथे आश्रयाला राहणाऱ्या ढोकरी,बगळे व त्यांची गूढ निवासस्थाने यांचा उल्लेख आपल्या प्राचीन साहित्यात आढळून येतो.हाल सातवाहनाच्या गाथासप्तशतीत रोजच्या दृश्यात आढळणाऱ्या बगळ्यांचे वर्णन केले आहे, ते अक्षर वाङ्मयात समावेश करण्यासारखे आहे.बगळी म्हणजे हिरवा शालू ल्यालेली गौरकाय लाडकी प्रिया. जलाशयाच्या किनारी एकान्तात प्रियकराची प्रतीक्षा करीत असलेल्या तिला पाहून कवीने त्या नाजूक भावप्रवण प्रसंगाचे वर्णन तितक्याच सहजतेने केले आहे.'पहा,कमळाच्या पानांमध्ये बगळी कशी एकाकी बसली आहे. जणू निर्मल पाचूच्या पूजापात्रात मोत्यांची शिंपली ठेवावी तशी ती शोभत आहे.' पण त्या प्रियेचे लक्ष कुठे आहे? अशा कातर वेळी सारंगागाराकडे उडत जाणाऱ्या बगळ्यांच्या पंक्तीकडे सारे ध्यान लागले आहे. तिच्या द्विधा, कातर मनःस्थितीचे वर्णन अलौकिक आहे."रविबिंब कोठे गेले ? चंद्र व तारे कोठे गेले ? ग्रहमान पाहण्यासाठी होराशास्त्रज्ञ रेघा काढतो, त्याप्रमाणे आकाशात बगळ्यांच्या रांगांनी काळ रेघा ओढीत आहे." बगळ्यांची रांग कुण्डलीमधल्या कोनासारखी असते हे सर्वांना ठाऊक आहेच.


मनोली


नवेगाव बांध जलाशयाकाठची पडार फुलली की त्या गुलाबी तांबूस मोहक फुलोऱ्यातून आसपासच्या तलाव, बोडी,

झिलाणीतील हिरव्यागार कोंगशीतून,पाणकणीस - नदीकाठच्या उसाच्या वाड्यांतून रंगीबेरंगी पाखरांचे थवेच्या थवे आहार-विहार करताना दिसले आणि स्मृतीचा ठेवा जागा झाला.पाणथळीतील लव्हाळी खसाच्या लवचिक काड्यांवर बसून ते हिंदोळे घ्यायचे,

कुठं सपाट जमिनीवरील गवताचे बी वेचताना पन्नास शंभरचा थवा भुर्रकन चिवचिव करीत उडायचा.किती प्रकारच्या ? तांबड्या रेड-मुनिया,तिलीया,स्पॉटेड मुनिया,काळ्या डोक्याच्या ब्लॅक हेडेड मुनिया,पांढऱ्या मानेच्या-व्हाइट थोटेड मुनिया,श्वेत पाठीच्या व्हाईट बॅक्ड मुनिया,हिरव्या रंगाच्या-ग्रीन मुनिया.त्यांच्या अपार्थिव सौंदर्याचा हेवा वाटायचा आणि रूपाला लाजेसे नाव 'मनोली'. सोनाली-रूपालीच्या परंपरेतलं नाव वाटतं हे.हिरवी मनोली फारच सुंदर दिसते. परंतु ही मनोली आता नामशेष होत आहे.


सात बहिणींच्या पाराखालच्या झिलाणीतील कोंगशीत त्यांची वीण ऑगस्ट-सप्टेंबरात होते. तिथल्या ढोपराएवढ्या खोल पाणथळीत हिरव्यागार पाचूची पवन बहरलेली असे.ह्या पक्ष्यांची इवलीशी घरटी अद्भुत व आनंददायी सौंदर्याचा जणू निधीच असे. घरट्याकडे झेप घेणाऱ्या ह्या गोजिरवाण्या, सुंदर पाखरांकडे पाहात मी सात बहिणींच्या पारावर तासन् तास बसत असे. समृद्धीबरोबर तिथे एक अनामिक गूढता नांदायची.


…..समाप्त…!!