live
मुख्यपृष्ठ
4/5/26
द्वेषमूर्ती हॅनिबॉल / Hateful Hannibal
4/3/26
द्वेषमूर्ती हॅनिबॉल / Hateful Hannibal
कार्थेजियन राजपुत्र...!
ग्रीक व इतर आर्य युरोपच्या मध्यभागी कार्यक्षेत्रात उतरले असताना तिकडे फोनिशियन लोक फार अशांत व अस्वस्थ झाले होते.टायर शहरातील फोनिशियन स्त्री-पुरुष येथील परिस्थितीला कंटाळले होते.जरा सुरेख नवे घर मिळावे म्हणून त्यांची धडपड सुरू झाली; नवे घर शोधावयाला ते बाहेर पडले.गलबतांत बसून ते भूमध्य समुद्रातून पश्चिमेकडे निघाले.आफ्रिकेतल्या अगदी उत्तरेच्या एका लहान प्रदेशावर ते उतरले.तो टापू सुपीक होता.
फोनिशियन तिथे वसाहत करू लागले.
त्यांनी तेथील मूळच्या रहिवाशांची कत्तल केली. हे मानवी बळी देऊन त्यांनी आपल्या देवाची प्रार्थना केली व त्याचे आभार मानले.समुद्राभिमुख अशी नवी वसाहत उभी राहिली व हळूहळू वाढू लागली. लवकरच तिथे भव्य व भरभराटलेले कार्थेज नगर उभे राहिले.
कार्थेजियनांनी फोनिशियनांपासून दोन गोष्टी घेतल्या; व्यापारातील कौशल्य व नरमेघावरील विश्वास. आफ्रिकेच्या उत्तर किनाऱ्यांवर,तशीच फ्रान्सच्या दक्षिण भागात व स्पेनमध्येही त्यांनी कितीतरी व्यापारी ठाणी बसविली.भूमध्य समुद्राच्या अर्ध्या भागावर त्यांचे प्रभुत्व होते व उरलेल्या अर्ध्या भागावरही प्रभुत्व प्रस्थापित करण्यासाठी ते आपले आधाशी गिधाडी डोळे फिरवू लागले.यज्ञप्रिय मोलोको देवाची सदिच्छा प्राप्त व्हावी, त्याची कृपादृष्टी असावी व त्यामुळे व्यापारात व लष्करी साहसांत आपणास यश यावे म्हणून ते पुन्हापुन्हा नरमेध करून त्याला मानवी मांसाची मेजवानी देत,लाच देत. काही असो,काही होवो,
मोलोक्कोला त्याचा पोटभर वाटा नेहमी मिळे,कार्थेजियन लढाईत विजय मिळवून परतले तर युद्धकैद्यांतल्या अत्यंत सुंदर कैद्याचा नैवेद्य ते भीषण मोलोक्को देवाला अर्पण करीत व पराभूत होऊन परत आले,तर आपल्यातल्याच मोठमोठ्या घराण्यांतील मुलेबाळे होळीत फेकीत.जय-पराजय काहीही झाले,तरी मोलोक्को देवाची चैनच होती.
राज्यासाठी आपल्या मुलाबाळांचे बळी देण्याची पद्धत आजतागायत सर्वत्र सुरूच आहे.कार्थेजियन जरी आपल्या मुलाबाळांना बळी देत,तरी एकंदरीत ते सुसंस्कृतच होते.त्यांची संस्कृती उच्च दर्जाची होती व म्हणून ज्या ज्या देशांशी ते व्यापार करीत,त्या सर्व देशांकडे ते तुच्छतेने बघत.विशेषतः रोमन लोकांच्या रानवट चालीरीती पाहून तर त्यांना गंमतच वाटे.हे आडदांड व रांगडे रोमन इटलीच्या पश्चिम किनाऱ्यावर भूमध्यसमुद्राच्या पलीकडे राहत.कार्थेजमध्येही येऊन काही रोमनांनी दुकाने वगैरे घेतली.ते रस्त्यामध्येच दुकाने मांडून बसत.त्यांची वागण्याची पद्धत खेडवळ होती व त्यांची शरीरे बुटकी होती.पण त्यांचा रुबाब मात्र मोठा होता.त्यांची ती शिष्टपणाने वागण्याची पद्धत व सुसंस्कृत भाषा पाहिल्यावर दोहोंतील विरोध चांगलाच डोळ्यांत भरे.कार्थेजमध्ये रोमची पुढीलप्रमाणे टिंगलटवाळी करण्यात येत असे;
संबंध रोमन शहरात चांदीचे ताट एकच आहे व कोणा सीनेटरला कोणास मेजवानी द्यावयाची असली म्हणजे त्याला ते ताट उसने आणावे लागते !
पण रोमन लोकांत सभ्यता,संस्कृती किंवा श्रीमंती नसली तरी ते महत्त्वाकांक्षी लढवय्ये होते.ज्या वेळी आर्य लोक उत्तरेकडून आल्प्स पर्वत ओलांडून खाली आले,त्या वेळेस त्यांच्यापैकी येथे राहिलेल्या आर्य लोकांचे वंशज ते हे इटालियन हे इटालियन लोक जेव्हा त्या पायाच्या आकाराच्या भूभागात गेले,तेव्हा त्यांना तिथे आधीच येऊन राहिलेल्या दोन जाती आढळल्या.
रानटी आयबेरियन व सुसंस्कृत युट्रस्कन तिथे होते. इटालियनांनी आयब्रेरियनांचा निःपात केला,युट्रस्कन लोकांपासून ते रस्ते बांधणे,शिल्पकाम,वैद्यकी,औषधे, ज्योतिषशास्त्र इत्यादी नाना गोष्टी शिकले,व मग त्यांनी आयबेरियनांप्रमाणे त्यांचाही निःपात केला, त्यांचेही उच्चाटन केले.हे इटालियन सारे एकजुटीने लढत नव्हते.त्यांचे निरनिराळे संघ होते.ते एकमेकांपासून पृथक् राहून सर्वत्र लूटमार करीत व सर्व देशाला सळो की पळो करून सोडीत.त्यांच्या जथ्यापैकी एक जथा तर फारच रानवट होता.पळून गेलेले गुलाम,अती शूद्र लोक व ठिकठिकाणचे परित्यक्त व बहिष्कृत लोक अशांचा तो जथ्था होता.त्यांनी टायबर नदीच्या मुखाजवळचा डोंगराळ प्रदेश जिंकून घेतला,त्याची तटबंदी केली व जे जे गुलाम पळून येत,चोर दरोडेखोर न्याय चुकविण्यासाठी आधार शोधीत जात,त्या सर्वांना तिथे आश्रय देण्यास सुरुवात केली.अशा रीतीने रोम शहर स्थापले गेले.
प्रथम त्यांच्या या वसाहतीत बायका नव्हत्या.पण ज्या ज्या गोष्टीची जरुरी भासेल ती ती गोष्ट मिळवून घ्यावयाचीच असा रोमन लोकांचा बाणा होता.जवळच्या सबाइन लोकांवर ते तुटून पडले व त्यांच्या बायकांपैकी अत्यंत सुंदर व घट्ट्याकट्ट्या बायकांना घेऊन गेले.त्या बायकाही जावयाला फारशा नाखूश होत्या असे नाही.विजयी रोमनांच्या बायका होण्यास त्या तयारच होत्या.या आपल्या नव्या बायकांच्या मदतीने त्यांनी सबाइन लोकांशी मैत्री केली व नंतर सारे इटालियन द्वीपकल्प पादाक्रांत करण्यासाठी ते निघाले.
त्यांची प्रगती फार झपाट्याने झाली नाही;पण जिथे ते पाय रोवीत तिथे ते तो भक्कम करीत.त्यांचे लष्करी तंत्र हळूहळू व पण निश्चितपणे शत्रूस चिरडून टाकी व शरण यावयास लावी.रोम शहराभोवतालची शंभर मैल घेराची जागा जिंकून घ्यावयास त्यांना तीनशे वर्षे लागली.पण एकदा तो प्रदेश जिंकून इटली ताब्यात घेतल्यावर इटलीत कोणीही त्यांच्याविरुद्ध डोके वर काढू शकला नाही.शस्त्रांनी लढून ते जो जो नवीन प्रदेश मिळवीत,तिथे तिथे लगेच रोमन वसाहत स्थापीत. अशा रीतीने रोमला अनुकूल अशा लोकांचे संबंध सर्वत्र पसरून सर्व इटली देश त्यांनी आपल्या ताब्यात ठेवला.
पण या बाहेरच्या विजयी मुलूखगिरीस घरच्या भांडणांमुळे अधूनमधून अडथळा येई.रोमन लोकांसारखे आपसात भांडणारे लोक जगाच्या इतिहासात दुसरे क्वचितच दिसून येतील.त्यांनी प्रथम युट्रस्कन लोकांतील राजांचे शासन मान्य केले;पण हळूहळू त्यांना या राजांचा वीट आला व त्यांनी निराळी शासनपद्धती सुरू केली.दरसाल दोन पालनकर्ते निवडले जात. प्रतिष्ठित नागरिकांचे एक पार्लमेंट असे.हे दोन पालनकर्ते या पार्लमेंटमधील प्रतिनिधींच्या सल्ल्याने राज्यकारभार चालवीत.
या प्रतिष्ठित प्रतिनीधींना 'पॅट्रिशियन' म्हणत.ज्या गुलामांनी व दरोडेखोरांनी रोम स्थापिले.त्यांच्या वंशजांना 'पॅट्रिशियन' किंवा 'वरच्या वर्गाचे लोक' म्हणण्यात येई.हे इतर लोकांचे जणू मायबापच ! जे गरीब व दरिद्री लोक असत,त्यांना 'प्लीबियन' म्हणण्यात येत असे.वरिष्ठ वर्गाच्या अहंमन्यतेमुळे व दुष्टतेमुळे हे सामान्य लोक शेवटी बंड करून उठले. त्यांनी सार्वत्रिक संप पुकारला.ते जवळच्या एका टेकडीवर गेले व तिथे प्रतिस्पर्धी असे दुसरे शहर उभारण्याची त्यांनी धमकी दिली.रोमच्या दरवाज्याजवळच असा एक प्रबळ शत्रू उत्पन्न झाला म्हणून प्रतिष्ठित पॅट्रिशियनांना भीती वाटली.त्यांनी प्लीबियनांना बोलावून त्यांनाही राज्यकारभारात भाग देण्याचे कबूल केले.तेव्हापासून हे सामान्य लोकही आपले प्रतिनिधी पाठवू लागले.बहुजन समाजाच्या या प्रतिनिधींना 'ट्रायब्यून्यस' म्हणत.अमुक एक कायदा आपल्या मतदारांच्या हिताविरुद्ध आहे असे वाटले, तर ते तो कायदा नामंजूर करू शकत.
जरी या तडजोडीमुळे रोमन लोकांची आपसांतील भांडणे तात्पुरती मिटली तरी भांडणांचे व द्वेष-मत्सरांचे वणवे पुन्हापुन्हा पेटतच,
असंतुष्ट लोकांची दुःखे,अती महत्त्वाकांक्षी लोकांच्या परस्परविरोधी महत्त्वाकांक्षा वगैरेंमुळे रोम शहर म्हणजे जणू खाटिकखानाच बने ! पण दरवाज्याच्या आत जरी ते आपसांत लढत असले, तरी बाहेर मात्र ते रोमची सत्ता वाढवीतच राहिले.
टायबर नदीच्या उत्तरेकडील जाती-जमाती रोमनांच्या ताब्यात प्रथम आल्या नंतर दक्षिणेकडील मॅग्ना ग्रीशीयात वसाहत केलेल्या लोकांस रोमनांच्या पोलादी मुठीचे बक्षीस मिळाले.या वसाहती ग्रीकांनी वसविल्या होत्या,हे मॅग्नागिशीया या नावावरूनच दिसून येत आहे. रोमनांनी त्यांना शस्त्रास्त्रांनी जिंकले तर उलट ग्रीकांनी त्यांना आपल्या लष्करी जेत्यांना स्वतःच्या उच्च संस्कृतीने जिंकले.रोमनांनी ग्रीकांचे संगीत घेतले;त्यांचे काव्य उचलेले;त्यांचे तत्त्वज्ञान,त्यांच्या देवदेवता सारे घेतले;त्याचा त्यांना नीट उपयोग मात्र करून घेता आला नाही.
हसणारे-खेळणारे थोर ग्रीक आदर्श घेऊन त्यांनी उग्र व भीषण चेहऱ्याचे व नेहमी खिन्न आणि रुष्ट असणारे प्रकार बनविले.रोमन लोक जेव्हा ग्रीकांचे अनुकरण करीत,तेव्हा एखादा हत्ती एखाद्या सुंदर नृत्यकुशलाचे अनुकरण करीत आहे असे वाटे.
पण झगड्यांवाचून मात्र ग्रीक वसाहती रोमनांना शरण गेल्या नाहीत.ग्रीकांनी एपिरसचा राजा पिन्हास मदतीस बोलाविले.
एपिरस देश म्हणजे अलेक्झांडरच्या आईचे माहेर.राजा पिन्हास याला आपण दुसरे अलेक्झांडर होणार असे वाटे. आपण रोमन लोकांचा तेव्हाच धुव्वा उडवून देऊ,
अशी त्याची कल्पना होती.रोमन लोकांची चटणी उडवून पुढे कार्थेजिनयनांसही जिंकावे व सारे जग जिंकून घेण्यास अशा रीतीने आरंभ करावा असे विचार त्याच्या मनात आले.
पिन्हासच्या स्वारीचा धोका समोर असल्यामुळे रोमनांनी व कार्थेजियनांनी एक होऊन परस्पर संरक्षक करार केला,रोम व कार्थेज ही दोन्ही समोरासमोरची शहरे भूमध्य समुद्रावरून परस्परांकडे मत्सराने पाहत असत. त्यांना एकमेकांचे वैषम्य वाटे.आफ्रिकेच्या खाद्यांवर बसलेले वैभवोन्मत कार्थेज शहर साऱ्या जगाचे आव्हान स्वीकारावयास तयार होते,इटली ताब्यात घेणारे रोमही स्वतःच्या महत्त्वाकांक्षांचे क्षितिज वाढवू लागले होते.या दोघांच्या दरम्यान समृद्ध व संपन्न सिसिली बेट होते. दोघांच्याही बुभुक्षित जिभांना सिसिली पाहून पाणी सुटत होते.सिसिलीचा कब्जा कोणी घ्यावयाचा या प्रश्नावर आज ना उद्या त्यांची जुंपणारच होती.पण पिन्हासने जेव्हा मॅग्ना ग्रीशियावर स्वारी केली,तेव्हा परस्पर स्पर्धाळू रोमन व कार्थेजियन लोक आपसातील भांडणे तात्पुरती विसरून समान शत्रूशी लढवण्यासाठी एक होऊन एका झेंड्याखाली जमले.त्यांनी आपसांतील मतभेद पुढे मिटवावयाचे असे ठरविले.
फारशी अडचण न पडताच रोमला पिन्हासवर विजय मिळाला व नंतर रोमने कार्थेजकडे नजर वळविली.
रोम व कार्थेज यांमधील पहिले युद्ध तेवीस वर्षे (ख्रि.पू. २६४ ते खि. पू. २४१) टिकले.'पहिले प्यूनिक फोनेशियन युद्ध' या नावाने ते प्रसिद्ध आहे.ते मुख्यतः आरमारी युद्ध होते.
मानवजातीची कथा,हेन्री थॉमस,अनुवाद - साने गुरुजी, मधुश्री पब्लिकेशन
सुरुवातीला कार्थेजियन अधिक हुशार खलाशी ठरले. पण युद्धाच्या हालचाली करण्यात रोमन लोक फार पटाईत होते.
युद्धातील गोष्टी ते झट्कन शिकत.प्रथम प्रथम त्यांचे आरमारी पराजित झाले,पण त्या पराजयांतून ते विजयाचे पेचप्रसंग शिकले.आरमारी लढाया कशा जिकाव्यात हे शिकून शेवटी आरमारी लढायात त्यांनी आपल्या गुरूंचा पराभव केला. रोमनांनी सिसिली जिंकली.तह होऊन एकमेंकाच्या वर्चस्वाखालचे प्रदेश नक्की झाले व परस्परांचा अडथळा न होता दोघांनाही लुटालूट करण्यास भरपूर वाव मिळावा,अशी व्यवस्था त्यांनी करून टाकली,पहिल्या प्यूनिक युद्धातील कार्थेजियनांचा पुढारी हमिल्कर बार्का हा होता.रोमनांनी पराजय केल्यावर पाच वर्षांनंतरची गोष्ट.हमिल्कर नऊ वर्षांच्या मुलाला घेऊन एके दिवशी रात्री बालच्या मंदिरात गेला व मोलोक्कोच्या मूर्तीपुढे त्याने त्याला "मी मरेपर्यंत रोमनांचा द्वेष करीन" अशी शपथ घ्यावयास लावली. मानवी यज्ञाहुती मिळण्यात मोलोक्को देवाला फार आनंद वाटत असे.
★★★ अपुर्ण,राहिलेला भाग पुढील लेखात…
4/1/26
कृतज्ञता - एक देणगी / Gratitude - a gift
आपल्या जीवनात ज्या काळात आपण जास्त जास्त गोष्टींचा हव्यास करतो,तेव्हा आपल्याजवळ असलेल्या गोष्टींबद्दल आपण समाधानी असावे.असं केल्यानं खूपदा आपल्याला आढळतं की, आपलं जीवन आजच भरून पावलं आहे.
द हाव्या महिन्यात आमच्या एकत्रित होणाऱ्या भेटीसाठी जेसन आला.मागच्या महिन्यात त्याचा जो धडा होता,त्याच्या असलेल्या गोष्टीच फक्त त्याला द्यायच्या होत्या,त्या त्याला महिनाभर देता येतील एवढ्या सापडल्या,याचा मला अजूनहि अचंबा वाटत होता.शिकलेल्या सर्व धड्यांचा मी विचार करत होतो, आणि मला आठवण झाली,की आता थोडेच धडे राहिले होते,आणि मग जेसनला रेड स्टीव्हन्सकडून सर्वोत्तम देणगी मिळणार होती.
माझ्या मनाची स्थिती जणू बेसबॉलमधल्या,ज्याची मेडन ओव्हर पूरी होत आल्यावर जशी होईल,तशी झाली, थोडीशी जरी चूक या टप्प्यावर झाली,तर हातातोंडाशी आलेल्या यशावर पाणी पडेल आणि कष्ट वाया जाणार असे होईल.जेसननं प्रत्येक महिन्याचं योजलेलं काम व्यवस्थित पार पाडलं होतं,आम्हा दोघांना एक काम तडीस नेल्यासारखं वाटलं,पण त्याच वेळेला असं वाटत होतं की आम्ही आधीच्या वेळेपेक्षा खूपच जास्त काही गमावण्याची शक्यता आहे.
मिस् हेस्टिंग्ज,जेसन आणि मी कॉन्फरन्स रूममधे जमलो होतो,तेव्हा मला वाटलं रेड स्टीव्हन्स आता आमच्या पुढ्यात काय घेऊन येतोय हे कळायला आम्ही सर्वच उत्सुक झालो होतो.मिस् हेस्टिंग्जने व्हिडिओ सुरू केला आणि रेड स्टीव्हन्सची परिचित छबी आमच्यासमोर आली.
"तुम्हाला सर्वांना शुभेच्छा,जेसनचं अभिनंदन आणि मिस्टर हॅमिल्टन आणि मिस् हेस्टिंग्जना धन्यवाद."
रेड स्टीव्हन्सन उजवा डोळा मिचकावला.पाच दशकांपेक्षा जास्त काळापासून त्याची ही लकब माझ्या परिचयाची होती.हे मिचकावणं कित्येक भाव सांगून जायचं.त्याच्या प्रेतयात्रेला जाऊन आल्यावर आता हे मिचकावण मला यापुढे कधीच दिसणार नाही,हे मला लक्षातच आलं नव्हतं.
त्याचं बोलणं सुरू झालं,"जेव्हा आपण आपलं मृत्युपत्र तयार करतो,आणि या व्हिडिओसारखी व्हिडिओ तयार करतो,तेव्हा आपोआपच आपण आपल्या सबंध आयुष्याचा विचार करतो.मी खूप ठिकाणी गेलोय, आणि खूप गोष्टींचा मी अनुभव घेतलाय,त्यामुळे की काय मी तर एकच जीवन जगलो हे लक्षात ठेवणं फार जड जातं.
"मी तरूण असतांनाची आठवण सांगतो,मी इतका गरीब होतो की,मला खायला अन्न मिळावं म्हणून दिवसभर कष्ट करावे लागायचे,आणि रात्री मी रस्त्याच्या कडेला झोपायचो.मला हे पण आठवतंय की अमीर उमराव,धनिक,श्रींमत यांच्या संगतीत मी होतो आणि अशा ऐषोआरामी जीवनाच्या सर्व गोष्टी मला ठाऊक होत्या.मी आज मागे वळून बघीतलं तर त्या गोष्टींबद्दल कृतज्ञतेनं माझं मन भरतं.
"मला वाटतं,ज्या काळाचे माझे भयंकर वाईट अनुभव आहेत,
त्या काळाच्या सुद्धा माझ्या काही आठवणी मात्र रम्य आहेत."
रेड थबकला,त्याच्या विचारांची जुळवाजुळव केली त्यानं,आणि दामटून बोलला तो."जेसन,या महिन्यात तू जो धडा शिकणार आहेस,त्याचा आवाका असा आहे की,त्यामुळे तुझ्या आयुष्यात ज्याचा पूर्ण अभाव आहे, त्याला स्पर्श होईल.तो अभाव असणारी गोष्ट म्हणजे कृतज्ञता.
"काय विडंबना आहे,काय विचित्र गंमत आहे पहा,या जगात ज्यांनी खूप कृतज्ञ असावं,ते जवळ जवळ अजिबात कृतज्ञ नसतात,आणि असेही खूप लोक असतात की जे जवळजवळ कंगाल असूनही अत्यंत कृतज्ञभावनेने जगत असतात. .
"मी तेव्हा तरूणच होतो.नुकताच स्वतःच्या पायावर उभा राहून जग जिंकू बघत होतो.तेव्हा मला एक गृहस्थ भेटला.त्याचं वर्णन आजच्या जगात बेघर असं करता येईल.मग पाह्यलं तर असे कित्येक लोक होते तेव्हा,की जे इथे तिथे बारीक सारीक काम करीत देशभर भटकत होते.तो मंदीचा काळ होता,आणि ही बरीच भटकी आणि उचलेगिरी करणारी माणसं चांगली सुशिक्षित होती,आणि त्यांच जीवन समृद्ध अनुभवांचं होतं,
"जवळजवळ वर्षभर मी आणि जॉश सहप्रवासी होतो. तेव्हा तो वयस्क वाटायचा मला पण मी तेव्हा अपरिपक्व वयाचा होतो,
त्यामुळे माझा कदाचित अंदाज चुकीचाही असेल,मला भेटलेल्या माणसांमध्ये तो असा एकमेव माणूस असेल की,ज्याच्याबाबत मी छातीठोकपणे सांगू शकतो की त्याच्या वाट्याला एकही वाईट दिवस आला नव्हता,आणि जर का त्याचा कधी दिवस वाईट गेलाच असेल तर त्याची कधीच दिसण्याजोगी खूण नसायची,
आम्ही इकडे तिकडे प्रवास करायचो,तेव्हा आम्हाला कधी भिजायला व्हायचं,कधी थंडीनं आम्ही कुडकुडायचो,तर कधी भुकेनं व्याकूळ असायचो.पण जॉशचा मूड कधी जायचा नाही.तो सर्वांशी चांगल्याच गोष्टी बोलायचा.
सर्वोत्तम देणगी,जिम स्टोव्हॅल
"शेवटी,मी जेव्हा टेक्ससमध्ये कायम वास्तव्य करायचं आणि तेथे माझं नशीब आजमवायचं ठरवलं,तेव्हा मी आणि जॉशमधली साथ संपली,कुठे स्थिरस्थावर व्हायचं त्याच्या रक्तातच नव्हतं.आमचा वियोग होण्याच्या वेळी मी त्याला विचारलं,तो सदा असा मस्त मूडमध्ये का बरं असायचां ? त्यानं मला सांगितलं की त्याच्या आईने त्याला जो वारसा दिला होता,त्यांत मृत्युपत्रांतर्गत एक सुवर्णयादी होती.
त्यानं मला उलगडून सांगितलं की,तो बिछान्यात रोज सकाळी उठल्याबरोबर,जिथे तो असेल,तिथंही झोपेतून उठल्याबरोबर डोळ्यासमोर मनानं एक सोनेरी फलक आणतो,त्यावर त्याच्या आयुष्यात त्यानं ज्यांच्याबद्दल विशेष कृतज्ञ असावं अशा दहा गोष्टी लिहिलेल्या आहेत.त्यानं मला सांगितलं की,त्याच्या आईनं असं तिच्या आयुष्यभर अगदी रोज केलंय.त्यानं त्याच्या आईसोबत असं केलेलं असल्यामुळे त्यानं एकही दिवस चुकवलेला नाही.
जवळजवळ साठ वर्षांपूर्वी या उपक्रमात मी पण जॉशबरोबर असायचो.त्यामुळे की काय मी पण एकही दिवस चुकवला नाहीये,
आणि म्हणून मी आज या टप्प्यावर इथवर येऊन उभा आहे काही दिवशी मी खूपशा छोट्याछोट्या गोष्टींबद्दल आभारी असतो.आणि कधीकधी माझं जीवन आणि माझ्या भोवतालच्या सगळ्या गोष्टी याबद्दल मला विलक्षण धन्यता वाटते."
रेडनं घसा साफ केला,तो एक घोटभर पाणी प्यायला,जरा सावरला आणि पुढं बोलू लागला "जेसन,आज मी ती सुवर्णयादी मृत्युपत्राद्वारे तुझ्याकडे सुपुर्द करतो आहे.जॉशची आई,नंतर जॉश,त्याच्यामार्फत मी आणि आता तू,असा या यादीचा शंभर वर्षांहून जास्तच काळ प्रवास झालाय.जॉशच्या आईला हा उपक्रम कसा सापडला,हे मला माहित नाही,म्हणून ही गोष्ट मला माहित आहे त्यापेक्षाही जुनी असू शकेल.
"ते काही असू दे,मी आता तुझ्याकडे सोपवतोय आणि सुरूवातीला तू दक्षता बाळगलीस,
तर लवकरच ती गोष्ट तुझ्या श्वासोच्छ्वासाप्रमाणे केवळ तुझी होऊन जाईल."
"या महिन्यात तुझ्याकडे ज्याज्या गोष्टी आहेत,आणि त्यांच्याबाबत तू आभारी असावंस अशा गोष्टींचा तू विचार करायचा आहेस.
महिन्याच्या शेवटी तू जेव्हा परत येशील तेव्हा त्या सोनेरी यादीचा तुझा तर्जुमा मिस्टर हॅमिल्टनला उलगडून सांगायचा.मी आशा करतो की तुझ्या उरलेल्या आयुष्यभर तू हा उपक्रम राबवशील आणि मग आज जसा तो वारसा कुणाला सोपवण्याची विशेष संधी मला मिळते आहे,तशी परत तुलाही ती मिळेल."
रेडची छबी मावळली आणि पडदा रिकामा झाला.
दुसऱ्या दिवशी माझ्या नेहमीच्या सवयीने मी बरोबर पाच वाजता उठलो.गजराच्या घड्याळाशिवाय मी कित्येक वर्षे असा उठत आलोय.रेडनं जेसनला सांगितलेल्या सोनेरी यादीविषयी मी विचार करत पडून राहिलो,आणि अंथरूणाच्या बाहेर येईपर्यंत मी माझी स्वतःची यादी जुळवू लागलो.
अंथरूणातून बाहेर पडायला पूर्वी लागायचा त्यापेक्षा जास्तच वेळ आत्ता,म्हणजे ऐंशी वर्षांचा झाल्यावर लागायला लागला.म्हणून मग माझ्या लक्षात आलं की रोज रेड स्टीव्हन्सचा कृतज्ञतेचा धडा गिरवायला माझ्यापाशी खूप वेळ होता.
महिन्याचा शेवट जसजसा जवळ येऊ लागला.तसतशी मला जेसन स्टीव्हन्सची आठवण येऊ लागली. माझ्याप्रमाणे त्याचीही सोनेरी यादी करण्यात रोज प्रगती होत असावी,अशी मला आशा वाटत होती.मला चिंताच होती खरं तर,कारण प्रत्येक गोष्टींवर हक्क असल्यागत त्याची सगळी जिंदगी गेली होती.
महिन्याच्या शेवटच्या दिवशी जेसन जरा लवकरच आला.त्याच्या डोळ्यात चमक होती,आणि त्याची चाल जरा उडतीच होती.माझी चिंता जरा कमी झाली. जेसननं आणि मी हस्तांदोलन केलं,आणि त्यानं मिस् हेस्टिंग्जला अभिवादन केलं.मी माझ्या टेबलाशी बसलो, जेसननं मिस् हेस्टिंग्जसाठी खुर्ची सरकावली,आणि स्वतः तिच्या शेजारच्या रिकाम्या खुर्चीत स्वारी विराजमान झाली.
मी तर सांगूनच टाकलं,"वा छान मूडमध्ये दिसतोयस आज,जेसन."
तो मोठ्यानं हसला आणि म्हणाला,"मला कल्पना नव्हती,एवढी खूप कारणं निघालीयेत माझा मूड चांगला व्हायला."
जेसननं त्याची सोनेरी यादी सांगायला सुरूवात केली. "या महिन्यात अगदी रोज मी अशा गोष्टींचा विचार करीत होतो की ज्यांच्याकरिता मी कृतज्ञ असायला हवं. त्या इतक्या मोठ्या संख्येनं आहेत,याची मला कधीही कल्पना नव्हती.
"अगदी प्रथम म्हणजे,माझं आरोग्य.माझं आरोग्य नेहमी ठीकच असतं.गेले दहा महिने रेड आजोबांच्या मृत्युपत्राच्या कारणाने निरनिराळ्या लोकांना मी भेटलो, ज्यांना काही ना काही प्रकृतीच्या तक्रारी होत्या,म्हणून मी माझ्या चांगल्या आरोग्यासाठी नेहमीच कृतज्ञ राहीन."
"त्या खालोखाल,मी माझ्या तारूण्यासाठी कृतज्ञ आहे. आतापर्यंत आयुष्यात मी बऱ्याच महत्त्वाच्या गोष्टींना मुकलो आहे.पण मला वाटतं,तारूण्यामुळे कुठलाही अडथळा पार करता येईल.
"तिसरी बाब म्हणजे,माझं घर.मी त्यासाठी कृतज्ञ आहे. रेड आजोबांच्या दातृत्वामुळे हे सुंदर घर शक्य झालं. मला इतके दिवस त्याचं महत्त्व कळलंच नव्हतं,खरं तर कळायला हवं होतं,पण मृत्युपत्राच्या या सर्वोत्तम देणगीमुळे मला इतरांसोबत त्यात राहता आलं आणि त्याचं महत्त्व कळलं.
"चौथा क्रमांक येतो माझ्या मित्रांचा.मी त्यांचा ऋणी आहे."
त्यानं मिस् हेस्टिंग्जकडे आणि माझ्याकडे पाहिलं आणि तो पुढं वाचू लागला."तुम्ही दोघं ब्रायन, गस् कॉल्डवेल, रेड स्टीव्हन्स होममधली मुलं आणि मला नीट सांगता येत नाहीये,पण एक खास कारणास्तव - माझे रेड आजोबा.
"पाचवी गोष्ट म्हणजे,माझं शिक्षण,यासाठी मी धन्य आहे.जरी मी कॉलेजमध्ये फार लक्ष दिलं नाही तरी पुढे काही शिकायचं म्हटलं,शिक्षण आणि विद्या यांना माझ्या आयुष्याचा एक खराखुरा भाग करायचं तर,त्याची सामग्री मला मिळाली.
"सहावं स्थान,माझ्या रेड आजोबांमुळे मी वर्षानुवर्षे जिथं जिथं हिंडलो,जे जे अनुभवलं,त्याचं मी ऋण मानतो.
"मी माझ्या गाडीचे आभार मानतो,सातव्या क्रमांकाने. अगदी विश्वासाची,विसंबून रहावं अशी,आणि चालवायला गंमत वाटते अशी आहे ती.ब्रायनकडून मला ठाऊक झालं की,माझ्यासारखे सगळे नशिबवान नसतात.
"आठवा क्रमांक येतो माझ्या कुटुबाचा,इतकी वर्ष मी त्यांची किंमत नेहमी ओळखत नव्हतो.पण मी आता इतक त्याबद्दल शिकलोय की मी जास्त चांगल्या प्रकारे त्यांच्याबरोबर राहीन,आणि त्याच वेळेला नव्या नव्या लोकांबरोबर संबंध जोडून कौटुंबिक नातं निर्माण करीन.
"इतकी वर्ष रेड आजोबांनी मला जो पैसा दिला, त्याबद्दल मी फार धन्य आहे.हा क्रमांक नववा.पण याहून जास्त महत्त्वाचं,म्हणजे रेड आजोबांच्या प्रयत्नांमुळे पैशाचे विविध उपयोग आणि पैशाची किंमत मी शिकलो.याबद्दल भविष्यकाळात मला जास्त शिकायचंय आणि माझ्याजवळ असलेला पैसा अधिक शहाणपणानं कसा वापरायचा हे पण मी शिकणार आहे.
"आता शेवटचा क्रम दहावा.सर्वोत्तम देणगीकडे जाणाऱ्या प्रत्येक पायरीबद्दल मी धन्य आहे.मी रेड आजोबांचे आभार मानतो.त्यांनी माझ्या आयुष्याचा विचार करून विचारांची जुळवाजुळव केली.
त्यांची इच्छा अंमलात तुम्ही दोघांनी आणलीत.यासाठी मी तुमचे आभार मानतो.
मिस् हेस्टिंग्जनं त्याला रोखलं आणि ती म्हणाली, "जेसन,काय छान यादी आहे ही! सोनेरी यादी. कृतज्ञता,ही एक देणगी तुला चांगली समजली आहे."
जेसन हसला आणि म्हणाला,"मिस् हेस्टिंग्ज, खरोखर आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे मला असं खूप सांगण्यासारखं होतं.आपण ज्यांच्यासाठी कृतज्ञ रहावं, अशा कितीतरी गोष्टी आहेत,त्यांना दहापर्यंत मर्यादित ठेवणं फार कठीण आहे."
मी जेसनचं अभिनंदन केलं,आणि जेसननं निरोप घेण्याआधी आम्ही सर्वांनी हस्तांदोलन केलं.मी स्वतःला बजावलं की,दुसऱ्या दिवशी सकाळी जी सोनेरी यादी करीन त्यात जेसन आणि रेड स्टीव्हन्स दोघंही असतील. आणि मी ज्या गोष्टींसाठी स्वतःला धन्य मानावं अशा गोष्टींचा मी विचार करू लागलो.
●●● समाप्त ●●●
3/30/26
चेलपतंग : एक शिल्पकार / Chelpatang: A craftsman
चेलपतंग हे सामान्यतः पाण्यानजीक,तसेच तळ्यावर आणि नदीवर पावसाळ्यात उडताना दिसतात.बहुतेकांचा रंग भुरा असला,तरी त्याला काही अपवादही असतात.चेलपतंगाची मादी पाणवनस्पतीवर अंडी घालते.परंतु काही प्रकारचे पतंग पाण्यात प्रवेश करून तळ्यातील दगडा-धोंड्यांवर अंडी घालतात.अंड्यांच्या राशींचा पाण्याशी संपर्क येताच ती त्वरित फुगतात.सुमारे दहा दिवसांनी त्यांतून अर्भक बाहेर पडून पाण्यात वळवळताना दिसतात.बहुतेक चेलपतंगांची ही अर्भकं स्वतःभोवती कोष तयार करतात.त्यातून त्यांचं तोंड आणि पाय तेवढे दिसतात.या कोष करण्याच्या पद्धतीवरून त्यांच्या विविध जातींची ओळख होते. काहींना पाणगोगलगाईच्या कवचापासून कोष तयार करायला आवडतं.काही बारीक वाळूचे कण कोष तयार करण्याकरिता उपयोगात आणतात. तर काही पाण्यात पडलेल्या पानांपासून केलेल्या गोल चकत्यांचा कोष करतात. या गोल चकत्या अत्यंत अचूक असतात.कोणा माणसाला कात्रीच्या साह्यानंदेखील तशी एकसारख्या आकाराची वर्तुळं कापता येणार नाहीत. काही पतंग रेतीचे कण आणि झाडाच्या बारक्या काटक्या यांपासून कोष तयार करतात. कोष करण्यात चेलपतंगांच्या अर्भकांनी दाखविलेली सौंदर्यवृत्ती व कृतीतील अचूकता अभूतपूर्व असून,जीवशास्त्रज्ञांना त्याचं कोडं कित्येक वर्ष उलगडलं नव्हतं.
चेलपतंगाच्या डिंभकाचा (अर्भक) आहार नाजूक नसतो.
काही प्रामुख्यानं शाकाहारी आहेत,ते पाणवनस्पतीवर आपली उपजीविका करतात. काही मात्र मांसाहारी आहेत.ते कृमि कीटकांवर जगतात परंतु कित्येकदा ते एकमेकांनाच खाऊन टाकतात.जेव्हा त्यांची पूर्ण वाढ होते,तेव्हा ते कोषाचं दार लहान खडा किंवा वनस्पतीचा कचरा वापरून बंद करतात.काही काळ अशा अवस्थेत विश्रांती घेतल्यावर डिंभकांचा अवतार बदलून, त्यांचं पीलुकात (पुपा) रूपांतर होतं.या अवतारात त्यांचं प्रौढ पतंगांशी साम्य दिसत असलं,तरी त्यांचे अवयव मृदू व पिवळट पांढरे असतात.
गोलाकार शरीरावर लहान पंख खोवल्यासारखे उगवतात.हा अवतार अंदाजे पंधरा दिवस टिकतो.पीलुक आपल्या करवतीसारख्या जबड्यानं कोश कापून तो अत्यंत जोमानं मधल्या पायांच्या साहाय्यानं पोहत पाण्याबरोबर डोकावणाऱ्या पाणवनस्पतीवर किंवा दगडावर येतो.बाहेरील हवेच्या संर्पकात येताच त्याचं प्रौढ चेलपतंगात रूपांतर होतं.पीलुक आपल्या शरीराचा त्याग करून नवीन चेलपतंगाचं शरीर धारण करतो.पंख पूर्णपणे पसरले जातात अन् काही क्षणांतच चेलपतंग हवेत उडू लागतो. काही चेलपतंगांच्या जातीचा पूर्णावतार पाण्याच्या पृष्ठभागावरच होतो.अशा वेळी चेलपतंग हजारोंच्या समूहातून हवेत उडू लागलेले दिसतात.जर त्या पाण्यात ट्राउट मासे असतील,तर त्यांना चेलपतंगांच्या रूपानं जणू मेजवानीच मिळते.त्या वेळी जलपृष्ठावर मोठी खळबळ माजते.
सर्वच जातींच्या चेलपतंगांना कोषाचं आवरण राहात नाही.असे पतंग पाण्यात पिशवीच्या आकाराची जाळी तयार करतात.कोष-डिंभकापेक्षा हे विनकोषाचे डिंभक मोठे चपळ असतात.असे डिंभक ओढ्यातील दगडगोटे हलविले,की त्यांखाली आढळून येतात.अशा ठिकाणी त्यांच्या जाळयाही दिसून येतात.
कित्येक वेळा अशा जाळ्या पाणवनस्पतीच्या पानामागं तयार केलेल्या दृष्टोत्पत्तीस येतात.
चेलपतंगांची आणखी एक जात आहे.त्यांची अर्भकं दगडांना किंवा काड्याकुड्यांना चिकटलेल्या रेशमी लांब नळीत राहतात.ट्राउट माशांची शिकार करण्यासाठी चेलपतंगाचं आमिष गळाला लावतात. पतंगांचे सारे अवतार माशांना खूप आवडतात.
जंगलांतून वाहणारे ओढे,तळी,सरोवराचा परिसर किंवा नद्या ही जलस्थानं चेलपतंगांची आवडती निवासस्थानं आहेत.
अशा सुंदर जलस्थानाभोवती पक्षिनिरीक्षण करीत असताना मी चेलपतंगाच्या अवताराचंही निरीक्षण करीत असे.त्यामुळं ही पाणस्थळं मला अतिशय जवळून पाहता आल्यानं जो आनंद मिळाला,तो,वेगळाच.अशा जलस्थलावर कित्येक वेळा पक्षिजीवनाचा अभाव असला,तरी तेथील वास्तव्य मला कधी कंटाळवाणं वाटलं नाही.
कीटकांचं निरीक्षण करण्याचा छंद मला जडल्याचं श्रेय शाळेमधील माझ्या एका मित्राला आणि रानोपाळ हिंडणाऱ्या लिंबामामाला द्यावं लागेल. आमच्या गल्लीत पांडुरंग सुपे नावाचा माझा मित्र राहात असे.एक-दोन वर्षांनी तो पुढल्या वर्गात होता. गणित विषयात तो हुशार होता.मला कधी त्यात अडचण आली,की मी त्याच्याकडं धाव घेत असे.माडीवर एका लहानशा खोलीत तो अभ्यास करायचा.घडवंचीवर फळचा टाकून त्यानं आपल्या अभ्यासाची बैठक तयार केली होती.तीवर बसून तो खिडकीजवळ अभ्यास करताना दिसे.खोलीवर लिंबाची गर्द सावली पडे.तिथून बाहेर पाहिलं,की जिकडेतिकडं कडुनिंबाची,तर कुठं चिंच-पिंपळांची, तर कुठं शेवग्या-हादग्याची झाडं डोकावताना दिसत.फुलपाखरं गोळा करण्याचा त्याला छंद होता.एका जाड पुठ्यावर पांढरा कागद चिकटवून त्यावर विविध रंगा-आकारांची फुलपाखरं व पतंग टाचणीनं टोचून ठेवलेले दिसत.ते त्याच्या अभ्यासाच्या खोलीचं आकर्षण होतं.
जवळच असलेल्या रानात कित्येक वेळा मी त्याच्याबरोबर फुलपाखरं व पतंग पकडण्यासाठी साहाय्य करायला जाई.
अशा वेळी सुपे त्यांच्याविषयी खूप माहिती सांगायचा.
घरच्या गरीब परिस्थितीमुळं पांडुरंग सुपेला मॅट्रिकच्या पुढं शिक्षण घेता आलं नाही.नाही तर तो एखादा चांगला कीटकशास्त्रज्ञ झाला असता.
श्रावण महिन्यात लिंबामामाबरोबर माळकरीण आत्याच्या शेताकडं जाताना वाटेत विस्तीर्ण असं माळरान लागतं.
तिथल्या पाउलवाटेनं जाताना मला नाना रंगांची फुलपाखरं उडताना दिसायची. गवतातून जाताना विविध प्रकारचे आणि रंगारूपांचे तुडतुडे टणाटण उड्या मारताना आढळून यायचे.त्यांना पकडण्याच्या नादात मी कुठच्या कुठं मागं राहायचा.लिंबामामा आपल्या शेरडांबरोबर दूरपर्यंत निघून गेलेला असायचा. दुपारी एखाद्या शेताच्या बांधावरील झाडाच्या सावलीत बसून मी आईनं बांधून दिलेली दशमी खायचा.दूर सुंदर डोळ्यांसारखी दिसणारी पाण्याची डबकी किंवा एखादं छोटं तळं असायचं. लिंबामामाची वामकुक्षी चाललेली असायची. पाण्यावर जाणाऱ्या शेरडांच्या मागोमाग मीही जायचा.जाताना एखाद्या डबक्यात मला मासोळ्यांसारखी दिसणारी बेडकांची इवलीशी अर्भकं दिसायची.पाण्याकाठी बसून मी त्यांच्याकडं पाहात राही.
पाण्यात अनेक प्रकारचे कीटक असत. त्यांना हातातील काडीनं मी डिवचून पाहायचा. सायंकाळी परत येताना झुडपावर अनेक प्रकारचे पतंग बसलेले दिसत.ते फारसे उडत नसत.हात लावायला गेलं की ते लगेच उडून दुसऱ्या झुडपावर बसत.जिकडे-तिकडं नाना रंगांची रानफुलं फुललेली असत.
त्या रानफुलांकडं पाहात पाहातच मी घरी परतायचा.
लिंबामामा फारसा बोलत नसे;
परंतु त्याच्या अबोल सोबतीनं मला लहानपणी या माळरानातून मुक्तपणं भटकता आलं.तो एकच सावधगिरीची सूचना देई.कुठल्याही झुडपात हात घालू नकोस किंवा बिळात बोट घालू नकोस. कारण त्यात साप-किरडू दडून बसलेले असतात.
बालपणी माझ्या मनात असलेली कीटक जगाविषयीची जिज्ञासा मोठेपणी वनाधिकारी झाल्यावर जंगलातही पुरी करता आली.त्यांच्या अद्भुत जगाचा पाठपुरावा करता आला. जाणीवपूर्वक त्यांचं निरीक्षण करीत असताना कित्येक वेळा मी स्वतःला हरवून बसे.
पाखरमाया,मारुती चितमपल्ली, साहित्य प्रसार केंद्र,सीताबर्डी,नागपूर
मालवण आणि वेंगुर्ला इकडील खाडीत नावेतून प्रवास करताना मी पक्षिनिरीक्षण तर करायचाच, परंतु कीटकांचं अद्भुत जगही पाहायला विसरायचा नाही.एकदा बाभूळबनातून हिंडत असताना, बाभळीच्या फांदीला लटकलेल्या हाताच्या करंगळीएवढ्या लांबीचं बंडल चालू लागल्याचं मी पाहिलं.तो चेलपतंगाच्या सुरवंटांनी काट्यांपासून बनविलेला कोष होता.अशा प्रकारची घरं बांधण्यात ते मोठे कुशल असतात.
सुरवंट आपलं झुलतं घर काट्यांनी बांधताना पाहणं मोठं मनोरंजक असतं.पहिल्यांदा सुरवंट आपल्याभोवती अत्यंत चिवट,नळीच्या आकाराचा कोष विणतो.जर आत काय चाललं आहे हे पाहायचे असेल तर कात्रीनं कोष कापावा लागतो. रंगगोपनामुळं वातावरणात छोट्या जीवाला कसं संरक्षण मिळतं,याचं हे उत्तम उदाहरण आहे. कोषाच्या भोवती बाभळीच्या काट्यांचं आवरण असतं.मी त्या सुरवंटाच्या कारागिरीचं निरीक्षण करीत होतो.सुरुवातीला सुरवंटानं कोषाचं टोक रेशमाच्या धाग्यानं फांदीला नीट बांधलं.नंतर काट्याभोवतालची बारीक पानं त्यानं कुरतडून टाकली,कोषासहित तो काट्याजवळ पोहोचला. तिथं त्यानं पुन्हा कोष नीट अडकवला.काटा तोंडानं कुरतडून त्याचा तुकडा केला.तो लगेच कोषाच्या प्रवेशद्वाराजवळ चिकटवला.पुन्हा तो आत गडप झाला.नंतर कोषात विलक्षण हालचाल होत असल्याचं बाहेरून दिसलं.अचानक तो कोषाच्या दुसऱ्या छिद्रातून डोकावला.तोडलेला काटा त्यानं तिथं नीट लावून घेतला.पुढच्या तीन जोडीच्या पायानं तो काटा इकडून तिकडं हलवीत होता. आतून विणीचं काम करून त्यानं काटा पक्का बसविला.नंतर छिद्र बंद केलं,
कीटकसृष्टीतील हा वास्तुशास्त्रज्ञच.प्रत्येक काट्याची लांबी मोजून घ्यावी.त्यातील लांबीत कुठंही फरक आढळून येणार नाही.
चेलपतंगाला सुरवंट-कोषातून काढून त्याला काचेच्या स्वच्छ पाण्याच्या भांड्यात ठेवलं,की लगेच तो स्वतःभोवती कोष विणतो.भांड्यात जी साधनसामग्री ठेवलेली असेल,तिच्या साहाय्यानं सुरवंट बाहेरून कोष सजवितो.त्यात चिरमिरीएवढे लहान शंख ठेवल्यास सुरवंट त्यांचा उपयोग करतो. तसेच रंगीबेरंगी काचेच्या मण्यांचे आणि शिपल्यांचे पांढरे तुकडे भांड्यात ठेवले,तर त्या साहित्याचा देखील तो कलात्मकरीत्या उपयोग करतो.योग्य वेळी कलात्मक सजावटीच्या व्यापाचा विसर पडून त्याला पंख फुटतात.लगेच तो हवेत उडून जातो. मुक्त जगात गेल्यावर त्याला आपल्या कोषाची आठवण तरी होत असेल काय ?
■■■ समाप्त..■■■
3/28/26
माकडांचा हल्ला / Attack of the monkeys
▶ त्या वेळी दिलीप बंड यांनी नुकतीच पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आयुक्तपदाची सूत्रं हाती घेतली होती.ते अतिशय कार्यक्षम आणि पर्यावरणप्रेमी अधिकारी म्हणून प्रसिद्ध होते. आमचे मुख्य उद्यान अधीक्षक सुरेश साळुंक्यांनी मला फोन करून आयुक्तांची ओळख करून द्यायला त्यांच्या बंगल्यावर बोलावलं.ओळख-पाळख झाली.बोलता बोलता मी त्यांना म्हटलं, "सर,आपण प्राणिसंग्रहालय बघायला नक्की या.कधी येता?" मला वाटलं, ते म्हणतील, येतो वेळ मिळाला की.पण ते पटकन म्हणाले, "आजच येतो संध्याकाळी".झालं, माझं धाबे दणाणलं ! कारण त्या दिवशी नेमका मंगळवार होता.आमच्या साप्ताहिक सुटीचा वार. नवे आयुक्त भेटीला येणार आणि तयारी पूर्णपणे शून्य ! सगळे कर्मचारी आपापल्या घरी.पण आयुक्तांना आज येऊ नका तरी कसं म्हणणार? मी ताबडतोब तिथून बाहेर पडलो आणि आमच्या पार्कची होनहार सफाई कर्मचारी जयाकडे गेलो.जयाचं शिक्षण फारसं झालं नसलं,तरी पडेल ते काम ती मन लावून करत असे. नवीन कामं शिकत असे. पार्कचं काम आपलं मानून करत असे. तिला पार्कवर घेऊन आलो.अण्णा बोराटे निवासी वॉचमन होते. गणपत आणि राऊतही ड्युटीवर होते.हातात फारसा वेळ नव्हता. त्यामुळे आम्ही पटापट टीम पाडल्या आणि कामाला लागलो.गणपतने राजा,निकी,तारा,जेरी सर्वांना इनडोअर सेक्शनमध्ये बंद करून बिबट्यांचा पिंजरा साफ केला.राऊतने मगरकुंड उरकलं.सर्वांनी मिळून पक्षालय झाडून घेतलं.बोराटे अण्णांनी सर्पकुंड आणि ओटे स्वच्छ केले.जयाने सगळे पाथवे झाडून घेतले.आता उरलं मंकी हिल.मी एकटाच मंकी हिलवर गेलो.मागच्या बाजूला असलेल्या इनडोअर सेक्शनमधून छोट्या पुलावरून आऊटडोअर सेक्शनमध्ये आलो आणि कचरा गोळा करायला सुरुवात केली.
तुटक्या चपला,कोल्डड्रिंक्सच्या रिकाम्या बाटल्या,कसकसले रॅपर्स अशी बरीच सामग्री आमच्या 'सुजाण' प्रेक्षकांनी मंकी हिलवर भिरकावून तिथली शोभा वाढवली होती ! हातातल्या पोत्यात एकेक ऐवज जमा करत मी चाललो होतो.झाडांवरून सगळी माकडं माझी गंमत पाहत होती.एखादं खाली उतरून परत दुसऱ्या झाडावर चढून बसत असे.तोवर आमच्या परिवारात एक नवा सदस्यही दाखल झाला होता.गौरी आणि आक्क्याला पिल्लू झालं होतं.ते तेव्हा पाच-सहा महिन्यांचं असेल.ते नेहमी गौरीच्या किंवा एखाद्या माकड मावशीच्या कमरेला मिठी मारून बसत असे. त्यामुळे त्याला आम्ही 'मोबाइल' म्हणू लागलो.पुढे त्याचं ते नावच पडलं.तर मी कचरा गोळा करत असताना हा मोबाइल अचानक एका झाडावरून दुसऱ्या झाडावर जाण्यासाठी खाली उतरला आणि नेमका मी त्याच्या समोर आलो.एका हातात पोतं,दुसऱ्या हातात पाइपचा तुकडा हा माझा अवतार पाहून तो घाबरला असावा.सगळी माकडं एका झाडावर आणि हे पिल्लू एकटंच दुसऱ्या झाडावर.तो भीतीने मोठ्याने चीत्कारला. झालं,त्याच्या चित्कारण्याने डेंजरचा सिग्नल गेला.गौरीने झाडावरून उडी मारली आणि माझ्या कंबरेला ती जोरकस चावली.प्रचंड बेनांनी मी कळवळलो.तेवढ्यात राणीनेही थेट माझ्या पाठीवरच उडी घेतली आणि तिनेही माझ्या खांद्याचा चावा घेतला.राजीने तर अत्यंत आवेशाने पुढच्या बाजूने पोटावरच चाल केली.माकडांचा चीत्कार, माझं कळवळून ओरडणं, वेदना,जखमा आणि रक्त ! सगळा गोंधळ माजला.त्या तिघी तर मला सोडायलाच तयार नव्हत्या.
दरम्यान,मंकी हिलवरचा कोलाहल ऐकून प्रतिभा आणि तेजस धावत तिथे पोचले.त्यांनी मक्याची कणसं, शेंगा, चिकू,केळी- जे हाताला येईल ते आत फेकून त्या तिघी माकडिणींचं लक्ष विचलीत करण्याचा प्रयत्न सुरू केला.तेवढी संधी साधून मी अक्षरशः गडाबडा लोळत पाण्याच्या खंदकात उडी मारली.पोहता न येणाऱ्या आणि पाण्याची भीती वाटणाऱ्या मला पाण्यातच उडी मारायचं कसं सुचलं कुणास ठाऊक ! तेवढ्यात जय पाहुजा नावाचा आमचा स्वयंसेवक तिथे पोहोचला.त्याने पळतच सर्पकुंडावरची लाकडी शिडी आणली आणि खंदकात सोडली. तिच्यावरून चढत मी ताबडतोब बाहेर आलो आणि पळत घर गाठलं.जखमा किती गंभीर आहेत हे बघण्याचंही मला सुचलं नाही.डोक्यात फक्त एकच विचार होता, आयुक्त येण्याची वेळ झालीय.आपल्याला उशीर व्हायला नको.भराभरा रक्ताळलेले कपडे अक्षरशः सोलून काढले आणि सुके कपडे घालून,शर्ट इन करत मेन गेटकडे पळालो. यस ! टायमिंग वॉज परफेक्ट !... मी पोचायला आणि आयुक्तांची गाडी आत यायला.
सोयरे वनचरे,अनिल खैर,समकालीन प्रकाशन
आयुक्त दिलीप बंड यांनी आधी पक्षालय पाहिलं.मग शेकरु, बिबटे, मगर, साप- सगळं पाहून प्रश्न विचारत,गप्पा मारत आम्ही मंकी हिलवर गेलो.मंकी हिल पाहून बंडसाहेब खूष झाले. मला म्हणाले, "काय सुंदर माकडं आहेत। चावत बिवत नाहीत ना?" त्यांनीही नेमका हाच प्रश्न का विचारावा? त्यांना काय उत्तर द्यावं ते न कळून मी शांतच राहिलो.निघताना बंडसाहेब पुन्हा म्हणाले,"अनिल, खूप छान ठेवलं आहे तुम्ही पार्क.तुमच्या प्राणी-पक्ष्यांसाठी अजून काही लागत असेल तर तसा प्रस्ताव तयार करून द्या,मी लगेचच मंजूर करीन."आश्वासन देऊन ते निघून गेले.गाडी गेली आणि अचानक मी मटकन खुर्चीत बसलो.गेला तासभर स्वतःला कसंबसं रोखून धरलं होतं.आता मात्र वेदना सहन होईनात.पोटा-पाठीवरच्या जखमांमधून रक्तस्राव होऊन नव्याने घातलेले कपडेही ओले होऊ लागले होते.आयुक्तांबरोबर आलेल्या उद्यान अधिक्षक साळुंक्यांना घडलेली घटना थोडक्यात सांगितली.आधी का सांगितलं नाहीस, असं म्हणत ते माझ्यावर चांगलेच खवळले आणि त्यांनी मला गाडीत घालून ताबडतोब हॉस्पिटलला पाठवलं.पुढे हे दुखणं मला महिना दोन महिने पुरल.
त्या घटनेनंतर मी विचार करत राहिलो, की असं का घडलं असावं? गौरी, राणी, राजी सगळ्यांनाच मी वाढवलं होतं,प्रेमाने खाऊ घातलं होतं.गौरीचे डोहाळे पुरवले होते.तरी त्यांनी माझ्यावर हल्ला का करावा? माझ्या मते याचं एकच कारण होतं : तिच्या बाळाला माझ्यापासून धोका आहे अशी शंका तिला आली.बाळंत आई आणि तिचं पिल्लू यांच्यामधून जायचं नाही, हा निसर्गाचा संकेत मी नकळत मोडला होता. त्यामुळे एरवी माझ्यावर पूर्ण विश्वास टाकणाऱ्या त्या तीन माद्यांनी मला चांगलाच धडा शिकवला होता.त्यातल्या त्यात दिलासा एवढाच,की त्या माकडिणींच्या मदतीला कोणीही नर आला नाही.आक्क्याने माझ्यावर हल्ला केला असता तर माझं काय झालं असतं याचा विचारही करवत नाही."
◆◆◆ समाप्त ◆◆◆
"One must imagine Sisyphus happy" हे प्रसिद्ध वाक्य Albert Camus यांनी त्यांच्या The Myth of Sisyphus या निबंधात मांडले आहे. मानवी जीवनातील निरर्थकता (absurdity) समजून घेण्यासाठी आणि त्या निरर्थकतेला माणूस कसा प्रतिसाद देऊ शकतो, हे सांगण्यासाठी हे वाक्य अत्यंत महत्त्वाचे मानले जाते.
ग्रीक पुराणकथांमध्ये सिसिफस हा एक राजा होता. देवतांनी त्याला एक कठोर शिक्षा दिली होती—एक प्रचंड मोठा दगड डोंगरावर ढकलत शिखरापर्यंत न्यायचा; पण जसेच तो दगड शिखरावर पोहोचेल, तसेच तो पुन्हा खाली घसरून येईल. मग सिसिफसला पुन्हा तेच काम सुरू करावे लागेल. ही प्रक्रिया अनंत काळ चालणारी होती—अर्थहीन, कंटाळवाणी आणि अंतहीन.कॅम्यू यांच्या मते मानवी जीवनही काही अंशी असेच आहे. माणूस रोज उठतो, काम करतो, थकतो आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा तेच चक्र सुरू होते. शेवटी मृत्यू येतो. या संपूर्ण प्रक्रियेचा विचार केला, तर जीवनात अंतिम असा काही "अर्थ" दिसून येत नाही. यालाच कॅम्यू Absurdism म्हणतात—माणूस जीवनात अर्थ शोधतो; पण विश्व मात्र मठ्ठ, मख्ख आणि अर्थहीन आहे.
मग अशा परिस्थितीत आनंद कसा मिळवायचा?
इथेच कॅम्यूचा महत्त्वाचा मुद्दा पुढे येतो. सिसिफसच्या शिक्षेत कोणताही बदल होऊ शकत नाही. दगड पुन्हा खाली येणारच. पण त्या परिस्थितीकडे पाहण्याची त्याची मानसिकता मात्र बदलू शकते. कॅम्यू म्हणतात—जेव्हा सिसिफस दगड खाली घसरताना पाहतो आणि पुन्हा खाली चालत जातो, तेव्हा त्याला आपल्या परिस्थितीची पूर्ण जाणीव असते. त्याला ठाऊक असते की ही शिक्षा कधीच संपणार नाही. तरीसुद्धा तो बंडखोर वृत्तीने ते काम स्वीकारतो. म्हणूनच कॅम्यू शेवटी म्हणतात—"आपण सिसिफसला आनंदी असल्याची कल्पना केली पाहिजे."
जीवनाला एखादा उदात्त किंवा अंतिम अर्थ नसला तरी माणूस आपल्या जाणीवेच्या बळावर, स्वातंत्र्याच्या अनुभवातून आणि बंडखोर वृत्तीमधून स्वतःचा अर्थ निर्माण करू शकतो. जग कदाचित निरर्थक असू शकते; पण माणूस स्वतः निरर्थक नसतो. तो जगण्याची निवड करतो, संघर्ष करतो आणि त्या संघर्षातच स्वतःचा आनंद शोधतो.
"One must imagine Sisyphus happy" हे वाक्य जीवनाकडे पाहण्याचा एक वेगळा दृष्टिकोन देते. जीवनात अंतिम अर्थ नसला तरी माणसाने निराश होण्याची गरज नाही. उलट, हीच जाणीव त्याला अधिक स्वतंत्र, अधिक प्रामाणिक आणि अधिक जिवंत बनवते.
जग कदाचित निरर्थक असू शकते; पण त्या निरर्थकतेशी झुंज देत जगणारा माणूस मात्र अर्थपूर्ण असतो—आणि कदाचित त्यातच खरा आनंद दडलेला असतो.मला मात्र येथे चार्वाक कॅम्यूपेक्षा अधिक सुसंगत वाटतो. चार्वाक इतरांना सुखावण्याच्या भानगडीत फार पडत नाही. तो स्पष्टपणे सांगतो—सर्वप्रथम स्वतः सुख मिळवा; नंतर इतरांचा विचार करा. हा विचार स्वार्थी आणि स्वकेंद्री वाटू शकतो; पण कदाचित त्यातच शहाणपण दडलेले आहे. हे जग एका विशाल अरण्यासारखे आहे. या अरण्यात तुम्ही पिकनिकसाठी आला आहात. पिकनिक करण्यासाठी तुम्हाला जितकी जागा आवश्यक आहे, तेवढीच जागा स्वच्छ करून घ्या. संपूर्ण जंगल स्वच्छ झाल्यावरच मी पिकनिक करीन, असा विचार केलात तर ते कधीच घडणार नाही—आणि तुमची पिकनिकही कायमची राहून जाईल. अधिकचा व्याप नको अन ताप नको!
आमचे मित्र विनायक पाटील याच्याकडून व्हॉट्सअप माध्यमातून माझ्यापर्यंत आलेला वाचणीय लेख….