* विजय गायकवाड | Vijay Gaikawad

live

नमस्कार आपले स्वागत आहे. मी पुस्तके आणि मित्रांवर पैसे खर्च करतो,माझ्याकडे दगड आणि विटांवर खर्च करण्यासाठी पैसे नाहीत.- रस्किन बाँड.ही थोर माणसं व त्यांचे विचार मला पुस्तकात भेटलीत.ती भेटली आणि त्यांनी सांगितले कि, प्रत्येक दिवशी असं काही तरी करा की,ते तुम्हाला अधिक सुंदर उद्याच्या दिशेने खूप लांबवर घेऊन जाईल."- डोग फायरबाऊ.' सर्वियन कादंबरीकार मिलोराद पावीच यांचे एक वाक्य आहे ते म्हणतात - जोवर जगात पुस्तक वाचणाऱ्या वाचकांची संख्या बंदूकधारी सैनिका पेक्षा अधिक आहे तोवर काळजीच काहीच कारण नाही.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात.पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये.म्हणून अविरतपणे प्रयत्न करणारे मार्गदर्शक, मित्र धावून येतात.प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,डॉ.दीपक शेटे,आ.भरत बुटाले,प्रा.सर्जेराव राऊत,सुभाष ढगे,अनिल फारणे,डॉ.सुधीर सरवदे ,विश्वास खाडे, विनायक पाटील,संजय कुंभार,सतीश खाडे,मनोहर सुर्वे,गणेश खंदारे,तात्या गाडेकर, दादासाहेब गाडेकर, दादासाहेब ताजणे, पुस्तकातील घटना प्रसंग सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील यांनी केलेले आहे. मला लिहिण्याची प्रेरणा देणारी पुस्तके,लेखक,प्रकाशक,मित्र ही जगावेगळी माणसं माझ्या जीवनातील महत्वाचा टप्पा आहेत.... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ.मेघा गायकवाड, चिरंजीव मयान,माझ्या धावण्यातील गुरुवर्य नामदेव बरुरे,लुल्ला शेख मोठी ताई ,लहान ताई जयश्री शिंदे या सर्वांचेच मनापासून आभार व धन्यवाद मॅट्रिक फेल विजय गायकवाड

4/17/26

रंगी / colored

नारायणमामा दिवाळीत भाऊबिजेसाठी पुण्याहून आले होते.

बापूंच्या बरोबर ओसरीवर बसून गप्पा मारताना गावाचा आणि वाड्याचा विषय निघाला.नारायणमामांना एखाद्या गोष्टीची उत्सुकता वाटली तर त्याची सविस्तर माहिती ऐकायला आवडत असे,हे माहीत असल्याने बापू त्यांना सविस्तर माहिती सांगत होते -

पेशव्यांच्या काळात ही एक छोटीशी वाडी होती.सगळा भूभाग दुष्काळी होता.शेतकरी कोरडवाहू शेती करून गुजराण करत होते.व्यापारउदीम काहीच नव्हता.

कुठल्याशा लढाईत सरदार विंचुरकरांनी खूप मोठा पराक्रम केला म्हणून पेशव्यांनी त्यांना पाच गावं इनाम दिली.त्यात हा गावसुद्धा दिला.सरदार विंचुरकरांनी आपला प्रतिनिधी म्हणून रघोजी ह्या कर्तबगार माणसाला गावचा पाटील म्हणून नियुक्त केला आणि गाव वसवायला सांगितलं.रघोजीने स्वतःसाठी एक मोठी गढी बांधली आणि तिथून तो गावचा कारभार करू लागला.आजही गावात रघोजी बाबाची गढी आहे.

तिच्यात त्यांचे वंशज राहतात.दसऱ्याच्या दिवशी गावाबाहेरच्या मैदानात शमीच्या वृक्षाची पूजा करायला गाव जमतं तेव्हा अग्रपूजेचा मान आजही गढीवरच्या मंडळींचा असतो.शिवाय दरवर्षी गावात रघोजीबाबांची यात्रासुद्धा मोठ्या दणक्यात साजरी होते.तर,हे रघोजीबाबा मोठे कर्तबगार असावेत.त्यांनी पैठण आणि इतर ठिकाणांहून विणकर आणून इथे वसवले.त्यांना माग काढून दिले.आज हे गाव पैठणीसाठी संपूर्ण राज्यात प्रसिद्ध आहे.रघोजीबाबांनी गुजरात आणि राजस्थानातून व्यापाऱ्यांना निमंत्रण दिलं.ह्या व्यापाऱ्यांच्या पुढच्या पिढ्याही आज गावात समाधानाने राहत आहेत.गावात पाण्याची सोय व्हावी म्हणून गावच्या नगरशेटने गावाबाहेर एक मोठा तलाव बांधला.त्यामुळे गावातल्या जमिनीतल्या पाण्याची पातळी वाढली.आडा-विहिरींना उन्हाळ्यातले काही महिने सोडले तर भरपूर पाणी राहू लागलं.गावाचा व्यापार-उदीम वाढला.इथली रेशमी वस्त्रं शनिवारवाड्यातदेखील जाऊ लागली.गावात पैका आला.साहजिकच इथल्या व्यापाऱ्यांनी,

अंमलदारांनी मोठमोठे वाडे आणि गढ्या बांधल्या.नंतर त्यांच्या पुढच्या पिढ्या नोकरी धंद्यासाठी बाहेरगावी गेल्यामुळे त्यातले बरेच वाडे डागडुजीशिवाय ओसाड पडले.त्याकाळच्या पद्धतीप्रमाणे बऱ्याचशा वाड्यांत बळदं-भुयारं आहेत आणि त्यामुळे त्या संबंधीच्या आख्यायिकाही आहेत.

बापू सांगत होते - "आता आपला वाडा म्हणाल तर तो यशाच्या पहिल्या आईच्या वडिलांकडून माझ्याकडे आला आहे.तो त्यांच्या दोन पिढ्याआधी म्हणजे १८५० सालाच्या सुमारास बांधला गेला असावा." बापूंकडून वाड्याची सविस्तर माहिती ऐकून नारायणमामांच्या शेजारीच कान पाडून ऐकत बसलेल्या यशाच्या मनात वाड्याबद्दल वाटणाऱ्या अभिमानात भरच पडली.यशाला हा बलदंड वाडा मनापासून आवडायचा.बाहेरून दगडी भिंत सगळ्या वाड्याच्या रुंदीला ऐसपैस व्यापणाऱ्या ओट्यानंतर सुरू व्हायची. ओट्याच्या दोन्ही बाजूंना बसण्यासाठी सिमेंटचे कट्टे होते.घराचा मुख्य दरवाजा मजबूत लाकडाचा असून त्यावर उभ्या-आडव्या पट्ट्या मारलेल्या होत्या.त्यांच्या प्रत्येक जोडावर लोखंडी फुलं लावलेली होती. आतमधून दोन्ही बाजूंच्या कोनाड्यात अडसर बसवलेला तर दहा जणांनाही दरवाजा उघडता आला नसता.आत गेल्यावर फरशी टाकलेला चौक होता. त्याच्यावर उजेडासाठी मोठे धारे होते.चौकाच्या वरती थोड्याशा उंचीवर ओसरी होती.तिथे बापूंची बैठक होती.तक्क्याला टेकून चंचीतलं पान खाणाऱ्या बापूंशी सहसा कुळवाडी लोक चौकातच बसून बोलत.शेत कसणारे राधू,विश्वनाथ वरती आले तरी चौकाजवळच्या खांबांना टेकून बसत.बापूंच्या बैठकीवर कुणीच बसत नसत.ओसरीमधून स्वैपाकघरात जाण्यासाठी एक रस्ता देवघरातून जाई तर दुसरा मधल्या बोळीतून स्वैपाकघरात जाई.वाड्याच्या मध्यभागातल्या कोठीच्या आणि बाळंतिणीच्या खोलीनंतरचा भाग मारवाडी कुटुंबाला भाड्याने दिला होता.त्याच्यामागे अंगण.त्यात एका बाजूला आड आणि आंघोळीची प्रशस्त जागा तर दुसऱ्या बाजूला जनावरांचा गोठा आणि कोपऱ्यात संडास.वाड्याच्या बाहेरच्या बाजूला ओट्याला लागूनच एक खोली होती.ती वापरात नव्हती.

नुस्तीच बंद करून ठेवली होती.वाड्याचं वैशिष्ट्य म्हणजे स्वैपाकघरात असलेलं बळद.स्वैपाकघराच्या मध्यभागी ओट्याच्या समोरच बळदात उतरण्यासाठी एक दरवाजा होता.तो उघडला की,जमिनीला एक चौरस खड्डा असून वरती चौकट होती.आत उडी मारून गेलं की,डाव्या बाजूला सुमारे पंधरा फूट लांब,पाच फूट रुंद आणि चार फूट उंचीचं बळद होतं.ते दगडी भिंतींनी बांधलेलं होतं.मात्र बळदाच्या टोकाला एक मातीचा ओटा होता. 

कधीकाळी तो शेणाने सारवला जात होता.ओट्यावर तीन रांजण ठेवलेले लांबूनही दिसत.बळदात खूप सटरफटर सामान वर्षानुवर्षं वेगवगळ्या पूर्वजांनी टाकलेलं होतं.यशाची मोठी बहीण मुंबईत राहत होती. तिचे यजमान श्रीकांत ह्यांना यशा का कोण जाणे 'डॅनी' म्हणे.तर हे डॅनी आणि उषाताई एकदा सुट्टीत गावी आले होते तेव्हा बळदात उतरण्याची टूम निघाली होती.

बळदात धन आहे असा कुटुंबातच नाही तर गल्लीतही सगळ्यांचा समज होता.धन मिळालं की,ते कुणाचा तरी बळी घेतं असाही समज होता.त्यामुळे लेकीचा आणि जावयाचा जीव माई धोक्यात घालू इच्छित नव्हत्या.मरो तो पैसा,माझ्या सोन्यासारख्या जावयाचा न् लेकीचा जीव मला धोक्यात घालायचा नाही असा हेका माईंनी चालवला होता.माईंनी अगदी काकुळतीला येऊन विरोध केला होता पण डॅनींनी हट्टच धरला.ते आणि यशा उडी मारून बळदात उतरले. चारपाच वेळा तर सोबत घेतलेला कंदिल विझला तेव्हा उडी मारून ते जिथे उभे होते,तिथेच उभे राहिले.खाली गेल्या पन्नास वर्षांतली हस्तलिखित स्वरूपातली पंचांगं होती,ती त्या दोघांनी वर काढली.पुढे मात्र खूप अडगळ होती.त्या अडगळीखाली साप-विंचू असण्याची शक्यता होती.म्हणून ते पुढे गेले नाहीत.धूळमाखल्या अवस्थेत परत वरती चढून बाहेर आले.

ह्या बळदाच्या दरवाजाच्या फटीतून कितीदा तरी मोठे मोठे साप बाहेर येत असत.माई ह्या बळदाच्या दाराला मोठे,जड लाकडी पाट टेकवून ठेवत.एक पाट बसायला घेत.एका पाटावर पुढे पोथी ठेवून त्या वाचायला बसत.एकदा अशाच माई पोथी वाचत असताना अशोकभाऊचा मित्र शंकर आला.त्याने पाहिलं तर माईंनी पाठ टेकवलेल्या पाटाच्या वरतीच बळदाच्या फटीतून एका काळ्याभोर सापाचं तोंड बाहेर आलं होतं. त्याची जीभ मधूनमधून बाहेर लवलवत होती.शंकरने प्रसंगावधान राखून माईंना झटकन् पाटासकट बळदाच्या दरवाजापासून लांब ओढलं अन् वाडा एका मोठ्या संकटातून सुखरूप बाहेर पडला.नंतर दोनतीन प्रसंगी बळदातून साप आल्यावर तो दरवाजाच माईंनी मातीने लिंपून टाकला.वाड्याच्या बाहेरच्या बाजूला असलेल्या बंद खोलीवर बऱ्याच जणांचं लक्ष होतं.काही दुकानदारांना त्यांच्या दुकानाचा माल ठेवण्यासाठी गोदाम म्हणून वापरायला ती हवी होती.'

जयजवान मित्रमंडळा'ला कॅरम-पत्ते खेळायला पाहिजे होती.पण बापूंनी अशा कुठल्याही कामासाठी ती जागा देण्याचं नाकारलं.

त्यामुळे बरेच दिवस ती खोली कुलूप लावून बंद होती.वाड्याच्या बाहेरच्या बाजूला स्वतंत्र अशी ती जागा असल्याने तशी ती खोली दुर्लक्षितच होती.एक दिवस सकाळी मागच्या अंगणातल्या गोठ्यात पार्वती-लक्ष्मीला चारा घालण्याचं काम माई करत होत्या.सवयीप्रमाणे माईंच्या त्या दोघींशी गप्पा चालू होत्या.

तेवढ्यात रंगूबाई बाबू आणि छोट्या या तिच्या लहान मुलांना घेऊन वाड्याच्या मागच्या बाजूच्या दरवाजाने आत आली.रंगूबाई दोन घरी भांडी घासण्याचं काम करी.तिचा उल्लेख सगळे जण रंगी असाच करीत. रंगी पस्तिशीची,काळीसावळी पण नाकीडोळी नीटस अशी होती.तिच्या नाकात चमकी होती.रंगी म्हणजे आपल्या ऐन तारुण्यात बिनधास्त वागणारी तरुणी असावी.कारण तिच्या दोन्ही मुलांच्या वडिलांची नावं आणि आडनावं वेगवेगळी होती.रंगी आली त्यावेळी माई लक्ष्मीला थोपटत तिच्याशी बोलत होत्या.ती तिच्या गोऱ्ह्याला-नंद्याला चाटत होती नंद्या तिला लाडाने दुशा देत होता."बायो,तुझं पोरावर भारीच प्रेम.पण त्या नादात चारा खाण्याकडे दुर्लक्ष कशाला करतेस?" माई लक्ष्मीकडे कौतुकाने पाहत म्हणत होत्या.रंगीने हे वाक्य ऐकलं.माईंचं आपल्याकडे लक्ष वेधण्यासाठी ती थोडीशी खाकरली."काय गं रंगे,काय काम काढलंस? आणि अगदी पोरांसकट आलीसशी ?"

माईंच्या प्रश्नावर रंगीने तिचं काम सांगितलं.रंगीला गावाबाहेर राहत असलेल्या खोलीच्या मालकाने जागा रिकामी करायला सांगितलं होतं.त्याला वापरायला जागा कमी पडत होती म्हणे.त्यामुळे तिला वाड्याबाहेरची रिकामी आणि बंद असलेली खोली मिळाली तर हवी होती."माई,ह्या दोन पोरांना घरी सोडून दिवसभर कामाला यावं लागतं.माझी सगळी कामं इथली गल्लीतलीच हायत.त्यामुळे माझी चांगली सोय होईल." रंगीला मध्येच थांबवत माईंनी म्हटलं,"बापूंना विचारून सांगते. पण हे बघ रंगे,हा पोरीबाळींनी भरलेला वाडा आहे. थोडं जरी वावगं वागणं लक्षात आलं तर सोन्याला सांगून त्याच दिवशी तुझं सामान खोलीच्या बाहेर फेकून दिलं जाईल." रंगी खाली मान घालून म्हणाली,

"माईसाहेब,गेले ते दिवस.अन् देवळात,देवाच्यासमोर वंगाळ वागनं काय, पन वंगाळ इचार पन कुनी करतं काय ? तुमी बापूंकडं माझ्या पोरांकडं बघून सबुद टाका." "बरं." नंद्याला थोपटत माई म्हणाल्या.

यथावकाश रंगी तिच्या पोरांसकटत्या खोलीत राहायला आली आणि खोलीचं रंगरूपच पालटलं.खोलीची बाहेरची भिंत तिने लिपून काढली.त्याला चुना मारला. छोटंसं अंगण सारवल्याने स्वच्छ दिसू लागलं.बाबू आणि छोट्या गल्लीतल्या पोरांबरोबर भवरा,गोट्या वगैरे खेळायला लागले.ठकूबाई कामावर काही कारणांनी आल्या नाहीत तर रंगी वाड्यावर भांडी घासायला येऊ लागली.महिनापंधरा दिवसांतून एकदा स्वैपाकघर सोडून इतर खोल्या आणि ओसऱ्या शेणाने सारवायचं काम रंगीच नियमित करू लागली.स्वैपाकघर मात्र माई स्वतःच सारवायच्या.रंगी तरतरीत होती.बोलण्यात चतुर होती आणि महत्त्वाकांक्षीदेखील होती.वाड्यातल्या मुली ओट्याच्या कट्ट्यावर गप्पा मारत बसल्या की, आपल्या मोरीत भांडी घासता घासता त्या गप्पांमध्ये रंगीही सामील व्हायची.एक मात्र खरं की,तिच्या पूर्वीच्या आयुष्याबद्दल जे ऐकलं होतं त्याचा मागमूसही आता कुणालाच दिसला नव्हता.

पहाटेच्या अंधारात ती बाहेरच्या मोरीत आंघोळ करून घेई.उजाडताच पोरांना उठवी.मोठा बाबू आता गल्लीतल्याच मराठी मुलांची शाळा नं.२ मध्ये पाचवीच्या वर्गात जाऊ लागला होता. बाबू अभ्यासात यथातथाच होता.त्याचं अभ्यासात लक्ष नव्हतं.

काळ्या रंगाचा आणि पसरट नाकाचा बाबू त्याच्या निस्तेज डोळ्यांनी मख्खपणे तासन्तास कुठे तरी शून्यात बघत राही.छोट्या मात्र तरतरीत होता. गल्लीतली मुलं मारुतीच्या पारावर अभ्यास करत बसली की हा तिथे टक लावून बघत उभा राही. पुढच्याच वर्षी तो पहिलीत जाणार होता पण ऐकून ऐकून त्याचे दहा एके दहापर्यंतचे पाढे पाठ झाले होते. रंगी त्याला जवळ घेऊन म्हणे,"छोट्याला मी लई शिकिवनार ! शिकशील का न्हाई रे छोट्या ?" आईला खूश करण्यासाठी आणि तिच्यावर जास्त प्रभाव टाकण्यासाठी मग छोट्या बे एके बे मोठ्या आवाजात सुरू करायचा.

आईला म्हणायचा,"व्हय आये.म्या लय शिक्नार.यशादादासारकं साळामंदी जानार,विंग्रजी शिक्नार.यस फेस ठेस करनार!"

गावगोत,अष्टगंध प्रकाशन,माधव सावरगांकर

रंगी त्याला आणखीच जवळ ओढून घेत कुरवाळत राही.नवीन शैक्षणिक वर्ष सुरू व्हायची वेळ झाली.रंगी छोट्याचा जन्मदाखला घेऊन जोशी गुरुजींकडे गेली. जोशी गुरुजींना शाळेतल्या सगळ्या मुलांची नावं पाठ होती.बाबूची आई धाकट्या छोट्याला शाळेत नाव घालायला आलेली पाहून चष्म्याच्या वरच्या भागातून रोखून बघत अनुनासिक स्वरात त्यांनी विचारलं, "जन्माचा दाखला कुठाय?"

■■■ अपूर्ण शिल्लक भाग पुढील दोन भागात प्रकाशित होईल.■■■

4/15/26

बर्फाळ बेटावरचा संघर्ष Clash on the Ice Island

आता कॅम्पवर नाइट आणि अ‍ॅडा दोघंच उरतात.एक नवी लढाई सुरू होते.सुरुवातीचे काही दिवस नाइट उसना जोर आणून काम करतो;पण लवकरच त्याचं अवसान ओसरतं आणि त्याची प्रकृती झपाट्याने ढासळू लागते.एकदा बाहेर लाकडं आणण्यासाठी गेलेला असताना तो बर्फातच पडून राहिलेला अ‍ॅडाला दिसतो.त्याची शुद्ध हरपलेली असते.त्याला जागं करून अ‍ॅडा कसंबसं त्याला कॅम्पवर आणते.पण तेव्हापासून तो अंथरुणला खिळतो तो खिळतोच.नाइट मेला तर आपलं काय,हा भयकारी विचार अ‍ॅडाचा ताबा घेतो आणि आधी त्याच्यापासून चार हात लांब राहणारी अ‍ॅडा.त्याच्या शुश्रूषेला वाहून घेते.आता सगळी कामं तिच्यावरच येऊन पडतात.बाहेर लावलेल्या सापळ्यांमध्ये एखादा प्राणी अडकला आहे का ते पाहणं,लाकडं गोळा करणं,स्वयंपाक करणं,भांडी घासणं,पिण्याच्या पाण्यासाठी बर्फ गोळा करणं आणि आणखी शंभरशे साठ कामं.मधूनच सापळ्यात अडकलेला एखादा कोल्हा सोडला तर शिकार जवळपास नसतेच.त्यांच्याकडे असलेले खाद्यपदार्थ कसेबसे पुरवत नाइट आणि अ‍ॅडा तीन महिने काढतात. प्रत्येक दिवस अंगावर काटा घेऊन उगवत असतो; आजच्यापेक्षा कालचा बरा होता,असं वाटायला लावत असतो.आता नाइटला उठणं तर लांबच,जागच्या जागीदेखील हालचाल करणं शक्य होईनासं होतं.पुढे काय होणार याची चिन्हं दिसू लागतात;पण अ‍ॅडा तो विचारही मनात आणायला तयार नसते.रँगल बेटावर एकट्याने राहणं ही तिच्यासाठी अशक्य कोटीतली गोष्ट असते.धीर धरून ठेवण्यासाठी ती नवी युक्ती काढते.बेटावर आल्यापासून ती सर्वांना रोजनिशी लिहिताना पाहत आलेली असते. अगदी मरणासन्न अवस्थेतही नाइट आपल्या डायरीत काही तरी खरडत असतोच.आपणही डायरीत नोंदी केल्या नाहीत तर बाकीचे तिघं गेल्यावर आपण कोणत्या परिस्थितीत दिवस काढले हे कुणालाच कळणार नाही याची जाणीव अ‍ॅडाला होते.त्यामुळे ती स्वतःला नोंदी लिखाणात गुंतवून घेते.जसजशी नाइटची प्रकृती खालावू लागते,तसा धीर सुटून तो अ‍ॅडाला अद्वातद्वा बोलू लागतो,शिव्या देऊ लागतो.खरं तर 

अ‍ॅडा हा त्याचा एकमेव आधार असतो.तीच त्याची शुश्रूषा करत असते,त्याला जास्तीत जास्त खायला मिळावं यासाठी धडपडत असते;पण स्कर्व्हीने ताबा घेतल्याने नाइट हे सगळं समजण्याच्या पलीकडे गेलेला असतो.पण स्वतःच्या स्वार्थापोटी अ‍ॅडा त्याही स्थितीत तो जिवंत राहावा यासाठी प्रयत्न करत राहते.

मे महिना उजाडतो.आसपास अ‍ॅडाला काही पक्षी दिसू लागतात.ते पकडण्यासाठी ती जंग जंग पछाडते.१० मे. त्या दिवशी अ‍ॅडाचा पंचविसावा वाढदिवस असतो;पण एखादा जास्तीचा पावाचा तुकडा आणि बड्या मुश्किलीने पकडलेल्या पक्ष्याचं मांस यावरच तो साजरा होतो.नाइटच्या तब्येतीत अजूनही सुधारणा नसतेच. आणखी एक महिना याच संघर्षात जातो. हळूहळू अ‍ॅडाला पक्ष्यांची शिकार जमू लागते.पण पक्षी असतातच किती? सहा जूनला नाइटचा तिसावा वाढदिवस असतो;पण तो दिवस उगवतो नाइटचा मृत्यू जवळ असल्याची बातमी घेऊनच.आज की उद्या? रात्री की दिवसा? नेमका कधी,एवढाच आता प्रश्न असतो. रोज सकाळी जाग आल्यावर नाइटपाशी येऊन पाहताना अ‍ॅडाचं काळीज लकलकत असतं.२१ जूनला नाइट पुन्हा एकदा बेशुद्ध पडतो.त्याचे रागरंग काही ठीक दिसत नसतात.अ‍ॅडा त्याला उठवण्याचा प्रयत्न करत राहते.रडत-भेकत राहते.'प्लीज मला एकटीला सोडून जाऊ नकोस',असं म्हणत आक्रंदत राहते.थोड्या वेळाने नाइट डोळे उघडतो आणि आपण आता ठीक असल्याचं अ‍ॅडा ला सांगतो;पण तो ठीक नाही हे आता उघड असतं.त्या रात्री अ‍ॅडा घाबरतच झोपी जाते. सकाळी उठून ती आधी नाइटच्या बिछान्याकडे धाव घेते.तिची भीती खरी ठरलेली असते.त्याचा श्वासोच्छवास थांबलेला असतो.रात्रीतून कधी तरी नाइटचे प्राण गेलेले असतात.आता पुढे काय ?अ‍ॅडाला पहिली गोष्ट आठवते ती म्हणजे नाइटच्या मृत्यूची नोंद करायला हवी.गेल्या काही दिवसांपासून तिने गेलचा टाइपरायटर वापरायला सुरुवात केलेली असते.त्यात नवीन कागद घालून ती नाइटच्या मृत्यूची तारीख व वेळ नोंदवून ठेवते.

नाइटचा मृतदेह तिथून हलवणं अ‍ॅडासाठी अशक्य असतं.त्याला उचलण्याएवढी शक्ती तर तिच्या अंगात नसतेच,पण त्याच्यावर अंत्यसंस्कार करून बेटावरची उरलीसुरली मानवी सोबत नष्ट करण्याचं धाडसही तिच्यात नसतं. मेलेल्या का असेना पण माणसाची सोबत तिला हवी असते;पण मृतदेहासोबत त्याच खोलीत राहणं शक्य नसल्याने ती आपला मुक्काम स्टोअररूममध्ये हलवते.

आता मात्र अ‍ॅडा पूर्ण एकटी पडते.हजारो चौरस किलोमीटरच्या बेटावर पूर्ण एकटी.तिच्या डोक्यात हाच एक शब्द सतत घुमत राहतो.त्यातून बाहेर पडण्यासाठी ती स्वतःला रोजच्या कामात अडकवून घेते.जणू नाइट मेलाच नाही,असं मानून ती आधीचंच रूटिन चालू ठेवते.अगदी रोज संध्याकाळी आज दिवसभरात काय काय केलं ते नाइटला येऊन सांगण्यासकट.सकाळी खाणंं धुंडाळण्यासाठी बाहेर पडण्याआधी टाइपरायटरवर बसायचं आणि दिवसभर आपण काय काय करणार आहोत,कुठे कुठे जाणार आहोत,कधी परतणार आहोत याची नोंद करून ठेवायची.न जाणो चुकून-माकून नेमके आपण कॅम्पपासून लांब गेलेलो असताना जहाज आलं आणि आपल्याला न घेताच परत गेलं तर?सकाळी बाहेर पडून किनाऱ्यापर्यंत जायचं आणि गोठलेल्या समुद्राकडे बघत बसायचं,हा तिचा एकमेव विरंगुळा बनतो.न जाणो आपण अशी वाट पाहत असतानाच क्षितिजावर आपली सुटका करायला आलेलं जहाज दिसेल,अशी दिवास्वप्नं तिच्या मनात रेंगाळत असतात.याच किनाऱ्यावर त्यांची स्किन बोट लाब्लेली असते.बेटाला वळसा घालून बेटावरच्याच दूरच्या ठिकाणी जाण्यासाठी मोहीमवीर या बोटीचा वापर करत असत.अ‍ॅडानेही ही बोट एक-दोनदा वापरलेली असते. पण प्रत्यक्ष कुठे जाण्यापेक्षा ही स्किन बोट म्हणजे अ‍ॅडाच्या दृष्टीने मानसिक आधार असतो.या बेटावरून आपली सुटका होऊ शकते,असं त्या बोटीकडे पाहून तिला वाटत असतं.एके दिवशी सकाळी शिरस्त्याप्रमाणे अ‍ॅडा किनाऱ्यावर येऊन पाहते,तर बोट गायब.रात्रीतून सुटलेल्या सोसाट्याच्या वाऱ्यात बोट वाहून गेलेली असते.ते पाहून अ‍ॅडाचं अवसानच गळतं.त्या बोटीचा खरं तर तिला काहीही उपयोग नसतो.ती बोट घेऊन अ‍ॅडानोमला पोहोचू शकत नसते;पण तरीही नाइट गेल्यावर जसं भयाण,एकाकी वाटलं होतं तसंच तिला आत्ताही वाटतं.सलग दोन दिवस अ‍ॅडा त्या दुःखात बुडून राहते,रडत राहते.ना शिकारीसाठी बाहेर पडते,ना लाकडं गोळा करायला.पण लवकरच तिच्या लक्षात येतं,की हात-पाय हलवले नाहीत तर आपण खंगून मरू,बाकी काहीही घडणार नाही.मुलासाठी तरी आपल्याला जिवंत राहण्याचा प्रयत्न करायला हवा. स्वतःची कीव करून काहीही उपयोग नाही.एका क्षणी ती ठरवते की स्किन बोट पुन्हा तयार करायची.ही बोट चौघा मोहीमवीरांनी तयार केलेली असते.अ‍ॅडाने फक्त ती तयार होताना पाहिलेलं असतं.

पण आता ती इरेला पेटते.जणू तिचं जीवन-मरण त्या बोटीवरच अवलंबून असतं.कित्येक दिवस खपून,चुकत माकत अखेर ती पूर्ण निरुपयोगी बोट तयार होते,तेव्हा कुठे अ‍ॅडा सुटकेचा निःश्वास सोडते.पण हे काम संपल्यावर रँग्लर बेटावरचं एकाकीपण पुन्हा तिला घेरून येतं.वाऱ्याच्या आवाजाशिवाय तिथे सारं काही निःशब्द असतं.अ‍ॅडा काम करत असताना होणारा आवाज,

टाइपरायटरची किटकिट आणि मोहिमेतल्या मांजरीशी अ‍ॅडाने मारलेल्या गप्पा,एवढेच काय,ते आवाज.ही मांजरच आता अ‍ॅडाची एकमेव साथी असते.तिच्यासोबत अ‍ॅडा सुखदुःखाच्या सगळ्या गोष्टी बोलत राहते.तिच्या बोलण्यात मुख्य दोनच विषय असतात एक, तिचा मुलगा आणि दुसरा,नोमच्या दिशेने जाण्यासाठी बाहेर पडलेले तिघे मोहीमवीर.आतापर्यंत ते नोमला पोहोचले असतील आणि लवकरच जहाज घेऊन आपल्या सुटकेसाठी इकडे येतील अशी तिला खात्री वाटत असते.वाटेत त्यांचं काही बरंवाईट झालं असेल, हा विचार मनात आणण्याचीही अ‍ॅडाची तयारी नसते.

अ‍ॅडाडाला आता शिकार जमू लागलेली असते. दोन-चार दिवसांनी एखादा पक्षी पकडण्यात तिला यश येत असतं.किंवा कधी तरी एखादा सीलही तिच्या जाळ्यात गावत असतो.पण प्राण्यांची संख्याच अजून तुटपुंजी असते.आणि खाण्याचा साठा तर जवळपास संपत आलेला असतो. २० ऑगस्टला ती आपल्याकडचा शेवटचा बिस्किटांचा पुडा फोडते.ही बिस्किटं संपली की तिला फक्त शिकारीवरच अवलंबून राहणं भाग असतं.क्रॉफर्ड आणि कंपनी आपल्याला घेण्यासाठी येईल का याबद्दल तिला अचानक शंका वाटू लागते.ते आले तरी त्याआधीच आपण उपासमारीने मरणार असं तिला वाटू लागतं.आपलं मरण इथेच लिहिलेलं आहे असं ती मनाने घेते.

... योगायोग म्हणजे नेमक्या त्याच दिवशी स्टीफन्सनने पाठवलेलं डोनाल्डसन हे जहाज घेऊन नॉइस हा खलाशी रँगल बेटावर पोहोचतो.बेटाला वळसा घालूनही त्याला कोणतीच मानवी चाहूल दिसत नाही.एका ठिकाणी त्याच्या सहकाऱ्यांना मोहीमवीरांचा जुना कॅम्प दिसतो;पण तिथे चिटपाखरूही नाही,हे पाहून त्यांची निराशा होते.या बर्फाळ बेटावर दोन वर्षं तग धरून राहणं अशक्य आहे असं नॉइसला आधीपासूनच वाटत असतं.बेटावरचा सन्नाटा पाहून तो विचार आणखीच बळावतो.बेटाला वळसा घालत एकदा दुर्बिणीतून पाहणी करायची आणि परत फिरायचं असं ते ठरवतात. त्यातल्या एका दुर्बिणीमध्ये अचानक एक मानवी आकृती चालताना दिसू लागतो.ती अ‍ॅडा असते.

जगण्याची आशा सोडून दिल्यानंतर तिच्या पुढ्यात अचानक माणसं येऊन ठाकतात.अ‍ॅडाचा खडतर संघर्ष अखेर यशस्वी झालेला असतो.

खरं तर अ‍ॅडा रँगल बेटावर गेलेली असते ती मोहीमवीरांना सहायक म्हणून;पण प्रत्यक्षात अ‍ॅडासोडून इतर साऱ्या मोहीमवीरांचा दुःखद शेवट होतो. नाइट आणि अ‍ॅडाला मागे ठेवून नोमच्या दिशेने गेलेल्या क्रॉफर्ड,मॉरर आणि गेल या तिघा मोहीमवीरांचा अखेरपर्यंत कुणालाही पत्ता लागत नाही.मानवी वस्तीवर पोहोचण्याआधीच टोकाच्या प्रतिकूल वातावरणाने त्यांचा बळी घेतला असणार हे उघड असतं.रँगल बेटावरून सुखरूप सुटका झाल्यावरही अ‍ॅडाच्या आयुष्यातला संघर्ष संपत नाही. 

मोहीमवीरांपैकी ती एकटीच बचावलेली असल्याने बेटावर काय घडलं हे सांगू शकणारी ती एकमेव व्यक्ती असते.त्यामुळे तिच्या कथनावर शंका व्यक्त केली जाते. तिच्यावर नाइटचा खून केल्याचा आरोपही केला जातो. पण ती मात्र ते सारं सहन करून या चारही मोहीमवीरांच्या घरी जाऊन,त्यांच्या कुटुंबीयांशी बोलून त्यांच्या शेवटच्या दिवसांची हकीगत त्यांना सांगते.आता आपली सुटका झाली,असं त्यानंतरच तिला वाटतं.

अ‍ॅडा ब्लॅकजॅक पुढे अमेरिकेतच स्थायिक होते. १९८३ साली वयाच्या ८५व्या वर्षी तिचं निधन होतं.अ‍ॅडा चा मुलगा बिली ब्लॅकजॅक जॉन्सन याच्या मुलाखती घेऊन आणि अ‍ॅडा च्या डायरीसह रँगल मोहिमेतील अनेक कागदपत्रांचा अभ्यास करून लेखिका जेनिफर निवेन हिने ‘अ‍ॅडा ब्लॅकजॅक : टू स्टोरी ऑफ सर्व्हयव्हल इन द आर्क्टिक' हे पुस्तक लिहिलं. ते २००३ साली प्रकाशित झालं.याशिवाय अ‍ॅडावर आणखीही काही पुस्तकं आणि असंख्य लेख लिहिले गेले आहेत.

◆◆◆ समाप्त ◆◆◆


4/13/26

बर्फाळ बेटावरचा संघर्ष Clash on the Ice Island

नोव्हेंबर येतो.हिवाळा वाढत जातो.मधल्या काळात अति शीत वातावरणात तग धरून राहण्यासाठी त्यांनी आणखी एक निवारा बांधलेला असतो,तिथे आता ते राहायला जातात.बेटावरचा मुक्काम आता हळूहळू खडतर बनत चाललेला असतो.थंडी वाढत जाते आणि प्राण्यांची संख्या मात्र कमी होत जाते.आता मांस जपून वापरणं गरजेचं होऊन बसतं.अ‍ॅडाच्या परिस्थितीत अजूनही फरक पडलेला नसतो.रडणं,काम न करता बसून राहणं किंवा क्रॉफर्डकडे बघत झुरत राहणं..एके दिवशी तर ती कॅम्पवरून अचानक गायब होते ती कित्येक तास उगवतच नाही.क्रॉफर्ड आणि नाइट तंगडतोड करून तिला शोधून आणतात.या चौघांवर भार बनून राहण्यापेक्षा जीव दिलेला बरा,असा विचार करून ती दिशाहीन भरकटत गेलेली असते.खरं तर आता हिवाळा आणखी वाढत जाणार असतो,निर्दयी बनत जाणार असतो.आता अ‍ॅडाने त्यांच्यासाठी कपडे शिवायला घेणं गरजेचं असतं,बूट दुरुस्त करणं गरजेचं असतं;पण तिचा वेडाचार कमी व्हायला तयार नसतो.ते तिला जेवण द्यायचं नाकारतात,घराच्या बाहेर ठेवून पाहतात,हरतऱ्हा करून पाहतात.काही दिवसांनी अ‍ॅडा पुन्हा गायब होते.दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा प्रचंड पायपीट करून ते तिला परत घेऊन येतात.आता रँगल मोहीम जणू अ‍ॅडाच्या वेडाचाराभोवतीच केंद्रित झालेली असते.तिची मदत होणं लांबच;उलट तिच्यामुळे या चौघांना आपापली कामं करणंही अवघड होऊन बसतं.

अ‍ॅडाअसं का वागत असते ?अ‍ॅडाला स्वतःला काय किंवा त्या चौघांना काय,कुणालाच त्या वेळी हे कळत नसतं की तिला 'आर्क्टिक हिस्टेरिया' झालेला आहे. अति थंड ठिकाणी प्रतिकूल आणि एकाकी जगणाऱ्यांना अनेकदा अशा हिस्टेरियाला सामोरं जावं लागतं.अ‍ॅडाला वेड लागलेलं नसतं,तर मरणाची थंडी आणि एकटेपणा तिला वेड्यासारखं वागणं भाग पाडत असतो.आणि आता तर २१ नोव्हेंबरला सूर्यास्त झाला की एकदम दोन महिन्यांनी २० जानेवारीलाच सूर्य उगवणार असतो. 

६० दिवसांच्या रात्रीसाठी या रँगल बेटावरच्या रहिवाशांना सज्ज असणं भाग असतं.पुढचे काही दिवस कल्पनेच्या पलीकडले असतात.अ‍ॅडाचं वेड दिवसेंदिवस वाढत जातं.कधी कधी ती दिवस दिवस गायब होते. चारही तरुण हातातली कामं सोडून तिच्या शोधात फिरत राहतात.परत आली तरी ती एका जागी बसून राहत असते.ती ना इतरांसाठी काम करू शकत असते, ना स्वतः साठी.अखेर एक वेळ अशी येते की अगदी संयमी आणि मायाळू क्रॉफर्डलाही मोह होतो की हिला कुत्र्यांच्या तोंडी द्यावं !

डिसेंबरमध्ये हवा आणखी खराब होते.पुन्हा एकदा कित्येक दिवस सगळा चमू त्यांच्या बर्फघरात अडकून पडतो.सारीच मंडळी सुस्तावतात.दिवस दिवस कोणी अंथरुणातूनही उठत नाही.पण आश्चर्य म्हणजे जसजसा या चौघांच्या वागण्यात बदल होऊ लागतो,तसं अचानकच अ‍ॅडाचं वागणं सुधारू लागतं.ती सकाळी सहा वाजताच उठू लागते,स्वतःचं आवरून सर्वांसाठी जेवण तयार करू लागते आणि दिवसभर कोणत्या ना कोणत्या कामात गढून राहते.शिकार केलेल्या जनावरांची कातडी सोलून ठेवणं,शिवणकाम करणं, चौघांचे कपडे स्वच्छ करणं,कपडे शिवणं,भांडी घासणं असे नाना उद्योग ती एकापाठोपाठ एक करत राहते.या चौघांसोबतच्या तिच्या वागण्यातही बदल होऊ लागतो. पुन्हा एकदा ती सर्वांशी हसून-खेळून वागू लागते. क्रॉफर्डकडे बघून झुरणंही कमी होतं.

चौघंही आश्चर्यचकित होऊन तिच्यातल्या या बदलाकडे पाहत राहतात.हा जणू चमत्कारच असतो.आणि निसर्गाशी झुंजणाऱ्या त्या चौघांना अशा चमत्काराची अतोनात गरज असते.

अ‍ॅडा इतकी बदलते की तिच्याबद्दलचा राग तर गायब होतोच,पण आपल्या वागण्याने आणि कामाने लवकरच ती चौघांचं मन जिंकून घेते.सूर्यदर्शनाशिवायचे दोन महिने कसेबसे का होईना,पार पडतील,असा विश्वास त्या पाचजणांना वाटू लागतो.

अखेर दोन महिन्यांची रात्र सरते आणि २५ जानेवारीला सूर्य क्षितिजावर किंचित डोकं वर काढतो,पण हवा मात्र सुधारत नाही.बर्फाची वादळं येत राहतात.प्राणी कमी होत जातात.रँगल बेटाचे हे रहिवासी अजूनही निवाऱ्यातून बाहेर पडून बेटावर वावरू शकत नाहीत. फेब्रुवारीत सूर्य थोडा आणखी वर येतो;पण थंडी मात्र कमी होत नाही,उलट ती वाढतेच.फेब्रुवारीच्या अखेरीस तापमान उणे ४७.५ वर पोचलं.दिवस-रात्र स्टोव्हसमोर काढण्यावाचून गत्यंतर राहत नाही.

बेटावर येण्यापूर्वी मोहिमेचा आयोजक स्टीफन्सन याने त्यांना खात्रीपूर्वक सांगितलेलं असतं,की बेटावर प्राण्यांची संख्या भरपूर आहे.काही झालं तरी शिकार कमी पडणार नाही.पण प्रत्यक्षात परिस्थिती मात्र वेगळी दिसत असते.प्राणी झपाट्याने कमी होत चाललेले असतात.अजूनही त्यांच्याकडे शिध्याचा साठा शिल्लक असला तरी आता त्यांना थोडी काळजी वाटायला सुरुवात होते.मार्च आणि एप्रिल हे दोन्ही महिने थंडीचे आणि घरात अडकवून ठेवणारेच ठरतात.अगदीच अत्यावश्यक कामांसाठी ही मंडळी बाहेर पडतात.आता प्रत्येकाच्याच मनात पुढे काय होणार याबाबत शंका येऊ लागलेली असते.शिधा संपण्याचा प्रश्न असतोच. पण बाहेर पडता आलं नाही तर संशोधनकार्य कसं चालू राहणार? आणि त्यासाठी तर ते जिवाची बाजी लावून इथे आलेले असतात.अखेर मे महिन्यात बर्फ वितळायला सुरुवात होते.तापमान किंचित वाढतं आणि आता जगणं थोडं सुसह्य होईल,अशी आशा पल्लवित होते.बर्फ वितळू लागल्याने त्यांच्या घराच्या भिंती ढासळू लागतात आणि पाण्याच्या डबक्यातच राहिल्यासारखी अवस्था होऊन जाते.अखेर त्यांना पुन्हा एकदा आपला मुक्काम हलवावा लागतो.ते करताना किती शक्ती खर्च होते हे त्यांचं त्यांना माहीत!तापमान वाढल्यावर पुन्हा एकदा प्राणी दिसू लागतील आणि पोटापाण्याचा प्रश्न मिटेल,ही आशा मात्र फोल ठरते.

आता खरं तर पाचहीजण थकलेले असतात..विटलेले असतात.एकटेपणाला,थंडीला,अपुऱ्या आणि बेचव जेवणाला.त्यांना घरची आठवण येऊ लागलेली असते. इथे राहायचं असेल,संशोधन करायचं असेल तर किमान खाणं-पिणं मुबलक हवं असं त्यांना वाटू लागलेलं असतं.त्यामुळे हे चौघं घरी परतण्याचा विचार करत नसले तरी शिधा घेऊन येणाऱ्या जहाजाची मात्र आतुरतेने वाट पाहू लागले असतात.जहाज आलं की अ‍ॅडा परतणार हेही आता सगळ्यांनी गृहीत घरलेलं असतं.आता फक्त एखादा महिना काढायचा की संपली आपली परीक्षा,असं अ‍ॅडाला वाटत असतं.ते साहजिकही असतं.संशोधनाची,साहसाची, आव्हानाची झिंग नसेल तर कुणी कशासाठी आपला जीव असा धोक्यात घालावा ?

पण तसं घडणार नसतं.तिकडे अमेरिकेमध्ये स्टीफन्सन रँगल बेटावर पाठवण्याचं सामान आणि ते नेणारं जहाज यांच्यासाठी पैसे उभे करण्याच्या मागे असतो;पण हवे तेवढे पैसे उभे राहणं अवघड जात असतं.मोहीमवीरांचे कुटुंबीयही त्यात त्याला मदत करत असतात.आपली तरुण पोरं जगाच्या टोकावरच्या त्या बेटावर कशी जगत असतील,या विचारानेही त्यांच्या जिवाचं पाणी पाणी होत असतं.इकडे जूनमध्ये कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक बर्फ वाढतो.तो महिना जहाजाची वाट बघण्यात जातो.जुलैमध्ये मात्र नाइटला कॅम्पवर अडकून राहणं असह्य होतं.तो एकटाच एका कुत्र्यासोबत बेटावर फेरफटका मारून येण्याचं ठरवतो.दक्षिणेकडच्या वॅरिंग पॉइंटपर्यंत जाऊन यायचं असा त्याचा विचार असतो. वाटेतली स्केलटेन नदी पूर्ण गोठलेली असते,त्यामुळे ती ओलांडणं अवघड जात नाही.पण वॅरिंग पॉइंटवर पोचताच आभाळ फाटल्यासारखा पाऊस सुरू होतो. भरीस भर म्हणजे नाइट तंबू आणायचा विसरलेला असतो.पाऊस सलग तीन दिवस कोसळत राहतो. संपूर्ण उघड्या बर्फाळ प्रदेशात नाइट आणि त्याचा कुत्रा मिळेल त्या आडोशाने कोरडं राहण्याची कसरत करत राहतात.तेवढ्या काळात नाइटला कसंबसं एक बदक मारता येतं.कुत्र्याला तर अन्नाचा कणही मिळत नाही. तीन दिवसांनी पाऊस थांबतो, तेव्हा कधी एकदा कॅम्पवर जाऊन पोचतो असं नाइटला झालेलं असतं. पण आता हा परतीचा प्रवास सोपा राहिलेला नसतो. येताना गोठलेली नदी आता वाहू लागलेली असते,हाडं गोठवणारं पाणी घेऊन.ती पोहत पार करण्याखेरीज दुसरा इलाजच नसतो.नाइट नदीत उतरतो,तेव्हा ती पार करण्याआधी असह्य थंडीने आपला जीव जाणार याची त्याला खात्री पटते.पण कसे कोण जाणे,तो आणि त्याचा कुत्राही सुखरूप पल्याड पोचतात आणि आणखी चार दिवसांनी पुन्हा कॅम्पवरही दाखल होतात. पण हा दौरा नाइटला चांगलाच महागात पडतो.

जुलैच्या अखेरीस बर्फ पूर्ण वितळून जातं.आता कुठल्याही क्षणी जहाज येऊन पोहोचेल या आशेने सर्वांचं लक्ष सतत समुद्राच्या दिशेने राहू लागतं. करायला शिकार नसते.होती नव्हती तेवढी सगळी पुस्तकं प्रत्येकाने पाच-सहा वेळा वाचून संपवलेली असतात. अनेकदा दुपारी दोन वाजताच त्यांचा दिवस संपून जात असतो.अ‍ॅडा मात्र काही ना काही काम करत बसलेली असते.कधी अ‍ॅडा आणि गेल जवळपास फिरायला जात असतात आणि नव्याने उगवलेल्या वनस्पती,फुलं कॅम्पवर आणून त्यांचा अभ्यास करत असतात.स्वयंपाकाचे थोडेफार प्रयोग करत राहणं हाही गेल आणि अ‍ॅडासाठी एक विरंगुळा असतो.

लवकरच त्यांना बेटावर येऊन वर्ष पूर्ण होणार असतं.वर्षभर रँगल बेटावर राहिलेली पहिली माणसं म्हणून त्यांचं नाव कायमचं इतिहासात कोरलं जाणार असतं. पण त्या वेळी त्यांच्या डोक्यात या कामगिरीचे नव्हे,तर फक्त शिधा घेऊन येणाऱ्या जहाजाचे विचार असतात.तिकडे कसाबसा निधी उभा करून जहाजाची व्यवस्था करण्यात स्टीफन्सनला यश येतं.२० ऑगस्टला टेडी बेअर नावाचं जहाज सगळी साधनसामग्री लादून रँगलच्या दिशेने कूच करतं;पण वाटेत या जहाजावरच्या कप्तान अन् खलाशांना आजवर कधीही पाहिला नाही एवढा बर्फ लागतो.एका टप्प्यावर तर रँगलकडे जाण्याचा मार्गच पूर्णपणे बर्फान अडवलेला असतो. वेगवेगळ्या दिशेने प्रयत्न करूनही पुढे जाणं त्यांना शक्य होत नाही,तेव्हा नाइलाजाने मोहीम गुंडाळून या जहाजाला मागे फिरावं लागतं.ही बातमी मोहीमवीरांच्या कुटुंबीयांसाठी घोर निराशा करणारी ठरते;पण स्टीफन्सन मात्र जराही विचलित होत नाही. त्यांच्याजवळची रसद आणि शिकार यांच्या आधारे मोहीमवीर बेटावर आणखी एक हिवाळा नक्की काढतील,हा त्याचा फाजील आत्मविश्वास अजूनही कायम असतो.पण या अपयशी जहाजाचा कॅप्टन बर्नाड याला मात्र धोक्याची जाणीव झालेली असते.या बेटावर राहणं शक्य असतं तर माणसांनी तिथे पूर्वीच वस्ती केली नसती का,एवढंच वाक्य तो बोलतो.त्याचं म्हणणं खरंच असतं.तिकडे स्टीफन्सन बिनधास्त असताना मोहीमवीरांची मात्र आता अस्तित्वाची लढाई सुरू झालेली असते.

सप्टेंबर उजाडतो,तसं मोहिमेच्या सदस्यांना कळून चुकतं की जहाज आता येणार नाही.जगाच्या एका टोकाला ते कायमचे अडकून पडले आहेत क्रॉफर्डन कॅमेरा सेट करून काढलेला ग्रुप फोटो धुऊन येतो तेव्हा लक्षात येतं की सगळ्यांचीच प्रकृती रोडावली आहे. विशेषतःनाइट तर पूर्ण खंगलेला असतो.स्केलटन नदी पार करून आल्यापासून त्याचं दुखणं खूपच बळावलेलं असतं.आधीच्या एका आर्क्टिक मोहिमेत त्याला व्हिटॅमिन 'सी'च्या कमतरतेमुळे होणारा 'स्कव्ही' आजार झालेला असतो.त्या वेळी भरपूर ताजं मांस खायला मिळाल्यामुळे तो त्यातून वाचतो.त्याच स्कव्हीने आता पुन्हा डोकं वर काढलेलं असतं.आणि इथे तर खायला ताजं मांसही नसतं.त्यामुळे नाइट जवळपास अंथरुणाला खिळतो.सतत चिडचिड करू लागतो, सहकाऱ्यांवर करवाद् लागतो.सगळ्यांपेक्षा कमी किंवा जवळपास शून्य काम करूनही त्याची सतत कशाबद्दल तरी तक्रार असते.सगळ्यात जास्त झोपूनही तो कमी झोप झाल्याबद्दल कुरकुरत राहतो.सगळेच त्याच्यावर वैतागून जातात.

नोव्हेंबरच्या मध्यात सूर्य पुन्हा गायब होण्याआधी अनेक दिवस खपून ते नवा कॅम्प वसवतात.जुन्या कॅम्पच्या आसपासची लाकडं संपल्यामुळे त्यांना जागा बदलणं भागच असतं.सूर्य नसण्याच्या काळात त्यांना जीव तगवून बेटावरच राहण्याशिवाय इलाज नसतो.पण जानेवारीत सूर्य उगवू लागल्यावर मात्र त्यांच्यातील काहीजणांना मदत बोलावण्यासाठी बाहेर पडावं लागणार हे सर्वांनीच गृहीत धरलेलं असतं.गोठलेल्या बर्फावरून चालत आपण सैबेरियापर्यंत जाऊ शकू असा त्यांचा अंदाज असतो.किमान तसा प्रयत्न करण्यावाचून गत्यंतर नाही,हे त्यांना कळून चुकलेलं असतं.त्यामुळे नव्या कॅम्पवर आल्या आल्या अ‍ॅडा नवे कपडे शिवण्याच्या आणि जुने दुरुस्त करण्याच्या मागे लागते. नव्या कॅम्पमधील घरं बर्फाने शक्य तेवढी पक्की करण्यात आणि शिकारीच्या प्रयत्नात त्यांचा बराचसा वेळ जातो.सर्वांच्या तब्येती आणखी खालावतात.

कसेबसे दोन महिने पार पडतात.जानेवारी महिना उजाडतो.क्रॉफर्ड आणि नाइट बाहेर पडून जवळच्या जमिनीच्या दिशेने चालत जाण्यास सुरुवात करण्याचा निर्णय घेतात.सात जानेवारी १९२३ ला पाच कुत्र्यांच्या घसरगाडीवर सामान लादून ते बाहेर पडतात;पण लवकरच त्यांच्या लक्षात येतं की आपण सोबत आणलेल्या सामानावर बाहेर जीव तगवणं अशक्य आहे.थंडीचा कडाका असह्य असतो.त्यामानाने कपडे आणि खाणं अगदीच अपुरं.तेवढं सामान ओढण्याएवढीही ताकद कुत्र्यांमध्ये उरलेली नसते. कोणत्याही दिशेला शिकार मिळण्याची चिन्हं दिसत नसतात.पण दुसरा पर्याय दिसत नसल्याने ते ठरलेल्या वाटेवर पुढे पुढे जात राहतात.पण थोड्या दिवसांतच थंडी आणखी वाढते.पुरेसं खाणं नसल्याने दोघांचाही अशक्तपणा वाढू लागतो.चालणं,मुक्कामासाठी तंबू ठोकणं,सगळंच हळूहळू अशक्य वाटू लागतं.शेवटी आठवड्याभराने नाइलाज होऊन ते कॅम्पवर परतण्याचा निर्णय घेतात.पुन्हा आठवड्याभराची थकवणारी वाटचाल करत कसेबसे कॅम्पवर पोहोचतात.

आता मोहीमवीर चांगल्याच कोंडीत सापडलेले असतात.इथून बाहेर पडून मार्ग शोधणं जवळपास अशक्य वाटत असतं,तर दुसरीकडे सोबतचा शिधा आणि शिकार दोन्ही संपत आल्यामुळे एका जागी मुक्काम ठोकून राहणं म्हणजे मृत्यूची वाट पाहण्यासारखंच असतं.त्यामुळे टीमचा कॅप्टन म्हणून क्रॉफर्ड निर्णय घेतो,आता आणखी जय्यत तयारीनिशी आपण स्वतः,मॉरर आणि गेलने मदत शोधण्यासाठी बाहेर पडावं.नाइटच्या स्कर्व्हने इतकं भयाण रूप धारण केलेलं असतं की तो आता कुठेही प्रवास करू शकणार नाही हे साऱ्यांनाच कळून चुकलेलं असतं.मॉरर आणि गेल दोघांनाही खरं तर हा निर्णय मान्य नसतो; पण टीम लीडरचं ऐकायचं म्हणून ते काहीही न बोलता तयार होतात.दुसरीकडे अ‍ॅडालाही नाइटबरोबर एकटीने राहणं म्हणजे मोठंच धर्मसंकट वाटत असतं.नाइटबद्दलची तिच्या मनातली भीती कमी झाली असली तरी पूर्ण गेलेली नसते.एकट्या पुरुषाबरोबर राहिलो तर जग काय म्हणेल याचीही काळजी असतेच.शिवाय आजारी माणसाबरोबर या बेटावर आपला निभाव कसा लागणार,हे तिच्या बुद्धीपलीकडचं असतं.पण परिस्थिती अशी असते की हा निर्णय स्वीकारण्यावाचून इलाजच नसतो.तिघांची निघण्याची तयारी सुरू असताना तापमान आणखी घसरतं.उणे ५६ अंश सेल्सियसमध्ये सर्वजण कामाला जुंपून घेतात.शक्य तेवढं खाण्याचं सामान;कपडे,तंबू बांधण्यासाठी लागणारी साधनं असं सारं जमवून २९ जानेवारीला तिघं सैबेरियामार्गे नोमला जाता येतं का हे पाहण्यासाठी बाहेर पडतात.

आपण परतू की नाही याची शाश्वती नसल्यामुळे शिरस्त्याप्रमाणे सर्वजण आपापल्या घरच्यांसाठी आणि स्टीफन्सनसाठी पत्रं लिहून ठेवतात.

राहिलेला भाग पुढील लेखामध्ये…..★★★


4/11/26

बर्फाळ बेटावरचा संघर्ष Clash on the Ice Island

चार संशोधकांची मदतनीस म्हणून उत्तर ध्रुवाजवळील निर्जन बेटावर गेलेल्या एका एस्किमो महिलेवर अखेरीस एकटीनेच जीव तगवण्याची वेळ येते.केवळ बफनि व्यापलेल्या त्या प्रदेशात तिचा कसा टिकाव लागतो त्याची गोष्ट.....!!

अ‍ॅडा ब्लॅकजॅक

१० सप्टेंबर १९२१ रोजी अलास्काच्या नोम शहरातून 'सिल्व्हर वेव्ह' नावाचं जहाज रंगल बेटाच्या दिशेने कूच करतं तेव्हा अ‍ॅडा ब्लॅकजॅकच्या मनात काहर माजलेलं असतं.

रँगलसारख्या उत्तर ध्रुवाजवळच्या निर्जन आणि बर्फाचं वाळवंट असणाऱ्या बेटावर वर्षभर मुक्काम ठोकण्याचा वेडेपणा आपण कसा काय करू शकतो हे तिला अजूनही कळत नसतं.अनाथाश्रमात वाढणाऱ्या आजारी मुलासाठी पैशांची गरज नसती तर तिने हे पाऊल कधीही उचललं नसतं. अ‍ॅडा एस्किमो असते;पण लहानपणी बहुतेक काळ मिशनरी शाळेत काढल्यामुळे बर्फाळ प्रदेशात टिकून राहण्याचं उपजत ज्ञान तिच्याकडे जवळपास नसतंच. इतर एस्किमो स्त्रियांप्रमाणे ती चांगली शिलाई करू शकत असते आणि मिशनरी शिक्षणामुळे तिला मोडकंतोडकं का होईना,इंग्रजी लिहिता-बोलता येत असतं एवढंच..

.. रँगल बेटाकडे निघालेल्या मोहिमेत तिचा समावेश होण्याचं कारण तेच असतं - इंग्रजीची तोंडओळख आणि शिंपिणीचं कसब.कॅनडाचा एक्सप्लोरर विल्हामुर स्टीफन्सन याने आखलेल्या या मोहिमेत चौघा साहसवीर संशोधकांनी भाग घेतलेला असतो.या मोहिमेचा प्रमुख असतो अ‍ॅलन क्रॉफर्ड हा २० वर्षांचा कॅनेडियन तरुण,त्याच्या सोबत लॉर्न नाइट (वय २८), फ्रेड मॉरर (वय २८) आणि मिल्टन गेल (वय १६) हे तिघं अमेरिकी या मोहिमेचा भाग असतात.रँगल आयलंडवर वर्षभर मुक्काम ठोकून तिथल्या परिस्थितीचा,दगड-मातीचा, प्राण्यांचा,

वनस्पतींचा, बदलत्या हवामानाचा अभ्यास करण्याची जबाबदारी त्यांच्यावर असते.शिवाय या बेटावर हक्क कुणाचा यासाठीही त्या काळी स्पर्धा सुरू असते.ब्रिटिश साम्राज्याचा भाग असलेल्या कॅनडामधील स्टीफन्सनला ब्रिटिशांसाठी या बेटावर हक्क प्रस्थापित करण्याची महत्त्वाकांक्षा असते.

या निर्जन बेटापर्यंत पोहोचणं आणि पुढे तिथे राहणं सोपं नसतं.हे तरुण वर्षभर तिथे राहू शकले तर रँगल बेटावर हिवाळा काढणारे ते पहिले मानवप्राणी ठरणार असतात.

पण माणसांनी जगण्यासाठी पूर्ण प्रतिकूल अशा बेटावर राहायचं तर त्यांना एस्किमोंची मदत घेणं भाग असतं. शिकार करायला,

प्राण्यांचं मांस शिजवून स्वयंपाक करायला,जळणासाठी लाकडं फोडायला आणि मुख्य म्हणजे या प्राण्यांच्या कातड्याचे कपडे शिवायला एस्किमो कुटुंब सोबत असणं आवश्यक असतं.त्यानुसार स्टीफन्सनने आपल्या नोममधल्या एजंटांकरवी काही एस्किमोंशी बोलणी करून ठेवलेली असतात;पण प्रत्यक्षात जाण्याची वेळ जवळ येते तसे अ‍ॅडा सोडून सगळे एस्किमो या मोहिमेकडे पाठ फिरवतात.या बेटाची कीर्तीच तशी असते.एक तर हे बेट कुणालाही जवळ येऊ देत नाही आणि कुणी जवळ गेलंच तर त्याला पुन्हा परत सोडत नाही,असं एस्किमोंमध्येही बोललं जात असतं.ही मोहीम धोकादायक आहे आणि एकदा त्या बेटावर गेलं की माणूस जिवंत परतणार नाही,अशी भीती सरसकट सगळ्या एस्किमोंना वाटत असते.अ‍ॅडाच्या मनातही ती भीती असतेच.एकीकडे पैशाची आत्यंतिक गरज आणि दुसरीकडे मृत्यूच्या खाईत नेणारी मोहीम,अशा कात्रीत अ‍ॅडा

सापडलेली असते.आपण परत आलो नाही तर आपल्या मुलाचं पुढे काय होईल याची कल्पनाही तिला करवत नाही.दुसरीकडे,मोहिमेला गेलो नाही तर जगण्यासाठी आणि मुलाला उपचार देण्यासाठी पैसे कुठून आणणार हा तिच्यापुढचा प्रश्न असतो.शेवटी मनावर दगड ठेवून अ‍ॅडा मोहिमेसाठी तयार होते.

सिल्व्हर वेव्ह जहाजावर या मोहिमेला लागणारी रसद भरली जाते.खाद्यपदार्थ,लिखाण आणि संशोधन साहित्य,हत्यारं, दारूगोळा,स्वयंपाकाची भांडी,शिया आणि ध्रुवीय कुत्री हे सगळं सामान आणि मोहिमेच्या सदस्यांना बेटावर सोडून जहाज पुन्हा नोमला परतणार असतं.एकदा का जहाज परत गेलं की पुन्हा मानवी वस्तीकडे परतण्याचं,एवढंच काय,तिकडे एखादा निरोप पाठवण्याचंही कोणतं साधन या मोहीमवीरांकडे असणार नसतं.एका अर्थाने ही हाराकिरीच. 

मोहिमेतल्या चौघा साहसवीरांनी ती स्वच्छेने पत्करलेली असते.अ‍ॅडासाठी मात्र ती नाइलाजाने स्वीकारलेली काळ्या पाण्याची शिक्षा असते.

१० सप्टेंबरला निघून सिल्व्हर वेव्ह जहाज १६ सप्टेंबरला रँगल बेटावर पोहोचतं.मोहीमवीर आणि जहाजावरचे खलाशी मिळून सामान बेटावर उतरवतात.

चौघंही आपापल्या घरी पाठवण्यासाठी शेवटची पत्रं लिहून जहाजाच्या कप्तानाकडे सोपवतात.आता जहाजाचा निरोप घेण्याची वेळ झालेली असते.चौघंही तरुण अतिशय आनंदात आणि रोमांचित अवस्थेत असतात.आपलं नाव इतिहासात कोरलं जाणार असल्याची जाणीव त्यांची छाती रुंद करत असते,तर इकडे अ‍ॅडा मात्र त्यांच्यापासून दूर धाय मोकलून रडत असते.आत्ताच्या आत्ता पळत जावं,जहाज थांबवावं नि या चौघांची माफी मागून नोमला परतावं,हा विचार तिच्या मनाचा ताबा घेऊ लागलेला असतो.आता आपला मुलगा पुन्हा कधीच दिसणार नाही,या जाणिवेने तिचं काळीज लक लक करत असतं.पण अचानक तिच्या मनात विचार येतो,'मीही निघून गेले तर या तरुण वेड्यांची काळजी कोण घेईल? त्यांचे कपडे कोण शिवेल? त्यांच्यासाठी जेवण कोण रांधेल? मला थांबायलाच हवं.' डोळ्यांतले अश्रू थोपवत अ‍ॅडा दूर होत जाणाऱ्या जहाजाकडे पाहत राहते.

जहाज गेल्यावर चौघंही झपाट्याने कामाला लागतात. राहण्यालायक आणि सामान ठेवण्यासाठी निवारे उभारणं हे त्यांचं पहिलं काम असतं.एक खोपटं राहण्यासाठी आणि एक सामान ठेवण्यासाठी.सलग १६ तास काम केल्यावर त्यांचे निवारे उभे राहतात.रँगल बेटाच्या या भागात नावालाही झाडं नसली तरी समुद्रातून वाहत आलेल्या लाकडांचा तिथे खच पडलेला असतो.

त्यांचा वापर करून घरं बांधली जातात.बर्फ पडायला सुरुवात झाली की बर्फाच्या भिंती उभारून घरं आणखी पक्की करण्याचा त्यांचा इरादा असतो.एस्किमो न मिळाल्याने सगळी कामं या चौघांनाच करावी लागतात.राहण्याची तात्पुरती व्यवस्था झाल्यावर लवकरच त्यांचा दिनक्रम ठरून जातो.

चौघंही तरुण रोज सकाळी उठून बेटाच्या अभ्यासाला बाहेर पडतात.जवळपासची टेकाडं पालथी घालायची, वनस्पतींचा अभ्यास करायचा,नमुने घ्यायचे,प्राण्यांची मोजदाद करायची आणि सँपल्स घेऊन दुपारपर्यंत कॅम्पकडे परतायचं,असा त्यांचा उद्योग ठरून जातो.कॅम्पवर आणखी कामं वाट बघत असतातच. सुरुवातीला उभे केलेले निवारे हे किमान गरजा भागवणारे असतात.त्यात सुधारणा,दुरुस्त्या,डागडुजी करण्याचं काम बराच काळ चालू राहतं.शिवाय ते करत असलेल्या अभ्यासाच्या,

आसपास दिसणाऱ्या परिसराच्या आणि रोज घडणाऱ्या छोट्या-मोठ्या घटनांच्या नोंदी आपापल्या वहीत करणं हे एक महत्त्वाचं काम असतं.अ‍ॅडापूर्णवेळ स्वयंपाकात तरी गुंतलेली असते किंवा काही ना काही शिवत तरी असते.

जसजसे दिवस जातात तसतशी रँगल बेटावरच्या या पाच रहिवाशांचीएकमेकांशी ओळख होत जाते. एकमेकांचे स्वभाव,त्यातल्या खाचाखोचा कळू लागतात.क्रॉफर्डला फालतू विनोद सांगायला आवडतात.नाइट चित्रविचित्र कविता रचत असतो.अ‍ॅडा नेहमी कोणत्या तरी प्रार्थना पुटपुटत असते आणि गेल कोणत्याही वेळी आपल्या वहीत किंवा टाइपरायटरावर काही तरी लिहित असतो.मॉररला शंभरशेसाठ औषधं घेण्याचा नाद असतो.डोकेदुखी, चक्कर,अपचन,बद्धकोष्ठ अशा कोणत्या ना कोणत्या तक्रारीवरची गोळी घेतल्याखेरीज त्याला झोप लागत नसते.

एकुणात त्यांचं छान चाललेलं असतं.स्वयंपाकघराच्या कोठीत भरपूर खाद्यपदार्थ असतात,शिवाय शिकार करण्यासाठी प्राणीही.ध्रुवीय अस्वलं,सील,कोल्हे, वॉलरस हे प्राणी आणि घुबड,सीगल,कावळे असे काही पक्षी या मंडळींना रोज दिसत असतात.जसा हिवाळा सुरू होईल तशी विशेषतःव्हाइट सील्सची संख्या वाढेल,असा ध्रुवीय प्रदेशाचा अनुभव असलेल्या नाइट आणि मॉरर यांचा होरा असतो.याचा अर्थ अन्न कमी पडण्याची शक्यता नाही.खरं तर चौघांपैकी कोणालाच बंदूक चालवण्याची किंवा शिकारीची फारशी माहिती नसते.पण शिकार करण्याखेरीज दुसरा इलाजही नसतो. त्यामुळे हळूहळू सगळेच हात साफ करून घेतात. पहिले काही दिवस नेम चुकतात,गडबड उडते;पण नंतर जमतं.बेटावर दाखल झाल्यानंतर आठ दिवसांत त्यांना अस्वलाची जंगी शिकार मिळते.एस्किमो अ‍ॅडासाठी शिकार नेहमीची असणार असा इतरांचा समज असतो; पण प्रत्यक्षात शिकार करणं तर दूरच,तिला बंदुकीच्या आवाजाचीही भीती वाटत असते.म्हणजे या कामी तिची काही मदत होणार नाही हे स्पष्ट होऊन जातं.

मृत्यू पाहिलेली माणसं,मृ त्यू च्या दारातून परतलेल्या व्यक्तींच्या थरारक कहाण्या,संकटांच्या वावटळीत तग धरून राहणाऱ्या सामान्यांमधल्या असामान्यांना,गोरी कानेटकर,समकालीन प्रकाशन

ते दाखल झाल्यानंतर काही दिवसांतच हिम पडायला सुरुवात होते.ते एवढं वाढतं की आठ दिवस सर्वांना घरातच अडकून पडावं लागतं.लागोपाठ त्यांच्यावर ध्रुवीय वादळाचं संकट येऊन आदळतं.दिवसेंदिवस पाचहीजण त्यांच्या छोट्या घरात अडकून पडतात.रँगल आयलंडने आपले खरे रंग दाखवायला सुरुवात केलेली असते.

या काळात पहिल्यांदा त्यांना अ‍ॅडाच्या वागण्यात काही तरी बदल जाणवू लागतो.आधी तो कळत-नकळत असतो.कधी ती आढ्याकडे बघत राहिलेली दिसते,तर कधी एकटीच मुसमुसत असल्याचं कुणाच्या तरी लक्षात येतं.पण नंतर मात्र त्याचं रूपांतर घळाघळा आणि कधी कधी धाय मोकलून रडण्यात होत जातं.

पुढे पुढे तर काम करत असताना पूर्ण वेळ ती रडतच असते.किंवा कधी काम सोडूनही.या तरुण मुलांना तिच्याबद्दल फारसं काही माहीत नसतं.तिचा घटस्फोट झालाय आणि मुलाच्या उपचारांसाठी तिला पैशांची गरज आहे, एवढंच त्यांना कळलेलं असतं.ती कशामुळे रडतेय, तिला काय होतंय हे विचारण्याचा ते प्रयत्न करत असतात;

पण बहुतेक वेळा त्याचा उपयोग होत नसतो.लवकरच आणखी एक गोष्ट त्यांच्या ध्यानात येऊ लागते.अ‍ॅडाच्या मनात क्रॉफर्डबद्दल एक हळवा कोपरा तयार झालाय.ती झपाट्याने त्याच्याकडे ओढली जातेय.तिच्या मनात क्रॉफर्डबद्दल आकर्षण निर्माण होणं साहजिक असतं.मॉरर हा त्यांच्यातला थोडा वडीलधारा आणि अलिप्त असतो.नाइट असतो बोलघेवडा,पण बराचसा आक्रमक.अ‍ॅडाला त्याची काहीशी भीतीच वाटत असते.

गेल तर अगदीच लहान मुलगा असतो.तरुण अ‍ॅडाला तो लहान भावासारखा वाटत असतो.त्यामुळे आपलं सारं लक्ष अ‍ॅडाने क्रॉफर्डवर केंद्रित केल्यास आश्चर्य नसतं.हे सगळं गमतीत चाललेलं असतं तर प्रश्न नाही;पण अ‍ॅडाने काम थांबवून रडत बसणं किंवा क्रॉफर्डसाठी झुरणं त्यांना परवडणारं नसतं.

रँगलसारख्या बेटावर तर ते जीवघेणंच ठरणार असतं.त्यामुळे तिला समजावण्याचे,धमकावण्याचे सगळे प्रयत्न ते करून पाहतात;पण व्यर्थ.

या कथेतील तीन भागापैकी पहिला भाग …।

4/9/26

पक्षिशास्त्रज्ञ अ‍ॅरिस्टॉटल / Ornithologist Aristotle

पक्षिशास्त्रज्ञ अ‍ॅरिस्टॉटल / Ornithologist Aristotle

सॉक्रेटिसचा शिष्य प्लेटो व प्लेटोचा शिष्य अ‍ॅरिस्टॉटल अशी अभूतपूर्व गुरु-शिष्याची परंपरा दृष्ट लागण्यासारखी आहे,पण अ‍ॅरिस्टॉटल मात्र नुसताच तत्त्ववेत्ता नव्हता,तर जगातील एक थोर चिंतनशील निसर्गज्ञानी होता,

पक्षिशास्त्रज्ञ म्हणून तर त्याचं कार्य फार मोठं आहे.

अशा या थोर पुरुषाचा जन्म अथेन्समधील स्टगिरा येथे इ. स. पूर्वी चौथ्या शतकात झाला.त्याचे वडील निकोमॅकस,अ‍ॅलेक्झांडरच्या आजोबांचे राजवैद्य होते. लहान असतानाच अ‍ॅरिस्टॉटल पोरका झाला.त्याच्या वडिलांचे जिवलग मित्र प्रोझेनस यांनी त्याला लहानाचं मोठं केलं.आयुष्याच्या पूर्वार्धात तो संरक्षण विभागात नोकरीस होता.परंतु युद्ध व त्या अनुषंगानं होणारी माणसांची हत्या यांचा उबग येऊन त्यानं ती नोकरी सोडली.उदरनिर्वाहाकरिता तो अथेन्स येथे औषधं विकत असे.एका ज्योतिषानं त्याला,अथेन्स येथे तत्त्वज्ञानाचा अभ्यास केल्यानं त्याचा भाग्योदय होईल, असं सांगितल्यावरून तो वयाच्या सतराव्या वर्षी प्लेटोच्या पाठशाळेत विद्यार्जनासाठी जाऊ लागला,

तेथे त्यानं तत्त्वज्ञानाचा सखोल अभ्यास केला.प्लेटोचा तो लाडका विद्यार्थी होता.प्लेटो कित्येकदा म्हणत असे की, माझ्यानंतरची परंपरा अ‍ॅरिस्टॉटल चालवील.गुरूचा आशीर्वाद खरा ठरला.त्याची कीर्ती झपाट्यानं ग्रीस देशात पसरली.ही वार्ता त्या काळी राज्य करीत असलेल्या अ‍ॅलेक्झांडरच्या वडिलांच्या कानावर गेली. त्यानं अ‍ॅरिस्टॉटलची नियुक्ती युवराज अ‍ॅलेक्झांडरचे शिक्षक म्हणून केली.त्या वेळी अ‍ॅरिस्टॉटल बेचाळीस वर्षांचा व युवराज अवघा पंधरा वर्षांचा होता.

बारा वर्षांहून अधिक काळ तो राजाश्रयाला राहिला. अलेक्झांडर सत्तावीस वर्षांचा असताना त्याच्या वडिलांचा खून एका अधिकाऱ्यानं केला.अशा राजनीतीचा उबग येऊन त्यानं राजदरबार सोडला.तो परत आपल्या गावी आला.राजाश्रयाला असताना त्यानं आपल्या जन्मगावावर फार उपकार केले होते.

युद्धात उद्ध्वस्त झालेलं ते गाव त्यानं राजाच्या साह्यानं परत वसविलं.देशोधडीला लागलेल्या तेथील नागरिकांना त्यानं पुन्हा बोलावून घेतलं.कित्येकांना गुलामगिरीतून मुक्त केलं.असा हा धर्मपुत्र परत आलेला पाहून सर्वांना आनंद झाला.त्यानं गावकऱ्यांच्या साहाय्यानं नवीन पाठशाळा स्थापन केली,

अ‍ॅरिस्टॉटलची ही पाठशाळा पुढे नावारूपाला आली.त्याच्या शाळेत विद्यार्जन करणं मोठ्या प्रतिष्ठेचं समजलं जाई,तो आपल्या विद्यार्थ्यांना पाठशाळेच्या पटांगणातून शिष्यगणासह चालत चालत शिकवीत असे.म्हणून त्याला पेरिपॅटेटिक म्हणून संबोधलं जाई.

तो नुसताच रूक्ष पंडित नव्हता.संसारी जीवनातही तो सुखी होता.त्याला दोन बायका होत्या.दोन मुलं होती. तो शानषोकीनं राही.उत्तम कपडे वापरी.बोटांत सोन्याच्या अंगठ्या घाली.पण त्याचा पिंड निसर्गात अधिक रमत असे.निसर्गात अनेक रहस्यं दडली आहेत.ती रहस्यं त्याच्या चिंतनाचा विषय होता.अशा गूढांचा शोध-बोध घेत भटकंती करावी,असं त्याला वाटे.पण निसर्ग-इतिहासाचा अभ्यास करणं,हे काही एकट्या-दुकट्या माणसाचं काम नाही.त्याला साधन-संपत्ती व राजाश्रय लागतो.या कार्यात त्याचा एके काळी विद्यार्थी असलेल्या सम्राट अ‍ॅलेक्झांडरनं साहाय्य केलं.त्याच्या दिमतीला विविध विषयांतील आठशे जाणकार त्यानं दिले.

राज्यातील शिकारी,पारधी आणि मासे मारणाऱ्या कोळ्यांना सूचना दिल्या की, वन्यजीवांविषयी शास्त्रीयदृष्ट्या काही माहिती मिळाल्यास त्यांनी ती अ‍ॅरिस्टॉटलला द्यावी.त्यानं निसर्गज्ञानाविषयीची शेकडो लक्षावधी हस्तलिखितं मिळवली नकाशे गोळा केले.वन्य जीवांचे नमुने प्रयासानं प्राप्त केले.आयुष्याच्या अखेरपर्यंत हे त्याचं कार्य चालू होतं.

अ‍ॅरिस्टॉटलनं विविध विषयांवर एकूण चारशे ग्रंथ लिहिले.बरेच ग्रंथ काळाच्या उदरात व युद्धाच्या खाईत नष्ट झाले.त्यांपैकी आता फक्त अठ्ठेचाळीस ग्रंथ उपलब्ध आहेत.याच काळात त्यानं भौतिक व आधिभौतिक शास्त्रावरील अलौकिक ग्रंथ प्रसिद्ध केले.ह्यामुळं सम्राटाची नाराजी झाली.

गुरूनं त्याला दिलेल्या अमूल्य ज्ञानाची तो स्वतःमध्ये जपणूक करीत होता.त्या ज्ञानाचा त्याला कोणी वाटेकरी नको होता.त्यानं आपल्या गुरूला पाठविलेल्या शेवटच्या पत्रात लिहिलं,"मला राजापेक्षा विद्वान होणं आवडलं असतं.माझा आनंद आपण हिरावून घेतला.माझी घोर निराशा झाली."

पण सम्राटाची रसिकता व दिलदारपणा आयुष्यात कधी कमी झाला नाही.म्हणूनच तो डायोनिअससारख्या निःसंग,विरक्त व ज्ञानी माणसाची जेवढी कदर करी, तेवढाच युद्धात शौर्य दाखविणाऱ्याचा गुणगौरव करी.राजरोष झाला तरी लोकांनी अ‍ॅरिस्टॉटलवर हात ठेवले नाहीत.त्यांच्यापुढं सॉक्रेटिसचं उदाहरण होतंच.

त्याचा 'हिस्टरी नॅचरॅलिस' हा ग्रंथराज अद्वितीय आहे.जग अ‍ॅरिस्टॉटलला प्राणिशास्त्राचा जनक म्हणूनच ओळखतं.ह्या अधिकारी व्यक्तीनं निसर्गाविषयी जे जे काही लिहिलं ते बहुमोलाचं आहे,परीक्षणापेक्षा शास्त्राला त्याच्यापासून सुरुवात होते.निसर्गाचा इतिहास लिहिण्यासाठी त्यानं अविश्रांत श्रम केले.त्याच्या सव्यसाची लेखणीनं स्पर्श केला नाही,असा कोणताही विषय नाही.परंतु या सर्वांत पक्षिशास्त्र हा त्याचा आवडता विषय होता.

पक्ष्यांचं वर्गीकरण त्यानं त्यांच्या बाह्य लक्षणांवरून केलं आहे.गरुड व घारीसारखे तीक्ष्ण नख्या असलेले तीन बोटांचे पक्षी,लावा,तितिर व रानकोंबड्यांसारखे साधी तीन बोटे असलेले,जमीन उकरणारे विष्किरी पक्षी आणि बोटं कातडीनं जोडलेले जलचर पक्षी असं त्यानं त्याचं वर्गीकरण केलं आहे.

ज्या पक्ष्यांना तीक्ष्ण नख्या असतात,त्यांच्या छातीचा भाग इतर पक्ष्यांपेक्षा अतिशय सशक्त असतो.त्यांच्या पायांना पुढं तीन व मागं एक बोट असतं.मानमोडी कुळातील पक्ष्यांच्या पायांना मात्र दोनच बोटं असतात. चोचीत जीभ व दातांचं स्थान आहे.नाक व कानासाठी छिद्रं असतात.त्यांचा उपयोग अनुक्रमे वास घेण्यासाठी व ऐकण्यासाठी होतो.डोळ्यांवरील पापण्यांना केस नसतात.ज्या पक्ष्यांना तीक्ष्ण नख्या नसतात त्यांना आर असते.

पाखरांच्या विणीविषयीच्या नोंदी मात्र अजूनही अबाधित आहेत.कोकिळा म्हणजे रूप बदललेला ससाणा नव्हे.दुसऱ्या पक्ष्यांची अंडी खाऊन त्यांच्या घरट्यात कोकिळा अंडी घालते आणि आपल्या पिलांचं संगोपन दुसऱ्या पक्ष्यांकडून करवून घेते.खंड्या, कस्तुरा, पंकोळी,बाज,श्येन व घुबड या पक्ष्यांच्या घरट्यांबाबत त्यानं मोठ्या विस्तारानं लिहिलं आहे.

पक्ष्यांच्या स्थलांतराविषयी त्यानं अत्यंत महत्त्वाच्या नोंदी केल्या आहेत.तो लिहितो,"क्रौंच रशियातील विस्तीर्ण पठारावरून नाईल नदीच्या उगमानजीकच्या दलदलीपर्यंत प्रवास करतात.पिवश्या ढोक,हंस, महाहंस पाणकोंबड्या व हरोळ्या पक्षी समशीतोष्ण प्रदेशात हिवाळाभर राहतात.पण शतकानुशतकं स्थलांतराविषयी चालत आलेल्या भ्रामक कल्पनांचं मूळ त्याच्याकडूनच आलं आहे.त्याचं म्हणणं असं की,काही पक्षी आपला काल हिमनिद्रेत घालवितात.या त्याच्या अनुमानाची पाळंमुळं इतकी खोल गेली होती की,डॉ.इलियट काऊससारख्या विद्वान अमेरिकन पक्षिशास्त्रज्ञानं आभोळीच्या हिमनिद्रेवर एकशेब्यांशी निबंध लिहिले. हिमनिद्रेत पक्षी वृक्षांची ढोली,गिरिपर्वतातील गुहा, कपारी व चिखलानं भरलेल्या दलदलीचा आश्रय घेतात. हा त्याचा सिद्धान्त केवळ आभोळी पक्ष्यापुरता मर्यादित नव्हता,तर महाबक व घारी इत्यादी पक्ष्यांचं आचरणही आभोळीप्रमाणंच असतं,असं त्याचं म्हणणं होतं.


पक्ष्यांच्या हिमनिद्रेविषयीच्या सिद्धान्ताचा प्रभाव

अ‍ॅरिस्टॉटलनंतर दोन हजार वर्षेपर्यंत पक्षिशास्त्रज्ञांवर होता.आभोळी पक्ष्यांचं हिवाळी निवासस्थान १९४४ साली त्यांच्या पायांतील कड्यांवरून शोधून काढण्यात आलं.परंतु आभोळीच्या हिवाळी स्थलांतराविषयीचं संपूर्ण गूढ अजूनही उकलता आलं नाही.

शब्दांचं धन,मारुती चितमपल्ली,छाया चितमपल्ली,प्रकाशक-मकरंद कुलकर्णी,साहित्य प्रसार केंद्र,सीताबर्डी,नागपूर

स्थलांतराच्या काळात पक्षी आपलं रूप बदलतात, असंही अ‍ॅरिस्टॉटलचं मत होतं.उत्तरेकडून काही पक्षी येताच दक्षिणेकडील पक्षी दक्षिण ध्रुवाकडे प्रयाण करतात.ऋतुमानातील बदलाप्रमाणं ते आपला पिसारा बदलतात.आता असं स्थलांतर करणारे पक्षी एकाच कुळातील असतात,असा शोध लागला आहे.

आकारानं मोठ्या पक्ष्यांचं स्थलांतर स्वीकारलं,तरी अगदी लहान लहान पक्षीदेखील स्थलांतर करतात,हे अ‍ॅरिस्टॉटलला मान्य नव्हतं,करकोचे व महाबक अशा मोठ्या पक्ष्यांच्या पाठीवर बसून लहान पक्षी प्रवास करतात.अशा प्रवासाच्या संधीची वाट पाहत छोटे पक्षी थव्याथव्यानं समुद्रकिनाऱ्यावर बसलेले आढळतात.असं त्यांन लिहून ठेवलं आहे.

¶¶¶ समाप्त ¶¶¶