* विजय गायकवाड | Vijay Gaikawad

live

नमस्कार आपले स्वागत आहे. मी पुस्तके आणि मित्रांवर पैसे खर्च करतो,माझ्याकडे दगड आणि विटांवर खर्च करण्यासाठी पैसे नाहीत.- रस्किन बाँड.ही थोर माणसं व त्यांचे विचार मला पुस्तकात भेटलीत.ती भेटली आणि त्यांनी सांगितले कि, प्रत्येक दिवशी असं काही तरी करा की,ते तुम्हाला अधिक सुंदर उद्याच्या दिशेने खूप लांबवर घेऊन जाईल."- डोग फायरबाऊ.' सर्वियन कादंबरीकार मिलोराद पावीच यांचे एक वाक्य आहे ते म्हणतात - जोवर जगात पुस्तक वाचणाऱ्या वाचकांची संख्या बंदूकधारी सैनिका पेक्षा अधिक आहे तोवर काळजीच काहीच कारण नाही.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात.पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये.म्हणून अविरतपणे प्रयत्न करणारे मार्गदर्शक, मित्र धावून येतात.प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,डॉ.दीपक शेटे,आ.भरत बुटाले,प्रा.सर्जेराव राऊत,सुभाष ढगे,अनिल फारणे,डॉ.सुधीर सरवदे ,विश्वास खाडे, विनायक पाटील,संजय कुंभार,सतीश खाडे,मनोहर सुर्वे,गणेश खंदारे,तात्या गाडेकर, दादासाहेब गाडेकर, दादासाहेब ताजणे, पुस्तकातील घटना प्रसंग सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील यांनी केलेले आहे. मला लिहिण्याची प्रेरणा देणारी पुस्तके,लेखक,प्रकाशक,मित्र ही जगावेगळी माणसं माझ्या जीवनातील महत्वाचा टप्पा आहेत.... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ.मेघा गायकवाड, चिरंजीव मयान,माझ्या धावण्यातील गुरुवर्य नामदेव बरुरे,लुल्ला शेख मोठी ताई ,लहान ताई जयश्री शिंदे या सर्वांचेच मनापासून आभार व धन्यवाद मॅट्रिक फेल विजय गायकवाड

4/23/26

मीराबाई - आगळंवेगळं धाडस / Meerabai - extraordinary courage

कदाचित मेवाडच्या मीराबाईने आगीत उडी घेतली असती,तर पद्मावतसारखा तिच्यावरचा सिनेमा आला असता आणि मग एकविसाव्या शतकातील पुरुषांचा फौजफाटा तिच्या मानसन्मानाच्या रक्षणाच्या नावाखाली काचा फोडायला आणि सार्वजनिक मालमत्तेची नासधूस करायला रस्त्यावर उतरला असता.काल्पनिक सौंदर्यवतींनी आपल्या अंगावरील जडजड आभूषणे आणि वस्त्रप्रावरणे सावरत धाडस आणि अविचल धैर्याच्या गोष्टी बोलायच्या,त्या बोलताबोलता हसतमुखाने चितेत उडी घेऊन प्राणत्याग करायचा अशा भ्रममूलक गोष्टींमुळे पितृसत्ताक मर्दानी अभिमान जेवढा जागृत होतो तेवढा अन्य कशामुळेही होत नाही. त्यामुळे (बहुधा काल्पनिकच) पद्मावती 'योग्य तऱ्हेच्या दुःखी नायिकेने मरावं' त्या प्रकारे मरते पण खरीखुरी मीराबाई मात्र 'योग्य प्रकारे झुकण्यास नकार देऊन' पुरुषसत्तेसमोर एक समस्याच उभी करते.पती रणांगणावर मृत्यू पावल्यावर चितेवर चढण्याऐवजी मीराबाईनं ठामपणे जाहीर केलं की, मी सती जाणार नाही.त्याऐवजी लाडकं दैवत श्रीकृष्ण याच्या स्तुतीपर कवनं गात गात जगण्याचा पर्याय तिनं निवडला.

राजपूत समाजाच्या उग्र धर्मरक्षकांच्या दबावाला ती जराही बळी पडली नाही.नंतरच्या काळात पितृसत्तेने तिला स्त्रीरूपातली 'देवभक्तीची साक्षात मूर्ती' म्हणून स्वीकारलं असलं,तरी तिच्या स्वतःच्या काव्यात मात्र आपल्याला स्वेच्छेने वागणारी एक स्त्री दिसते.

जिनं मानसन्मानाच्या सगळ्या प्रस्थापित संकल्पना झुगारून दिल्या आणि भोवतीच्या प्रत्येकच मर्त्य मानवाचा अधिकारही झुगारून दिला.

सोळाव्या शतकाचं तांबडं फुटत असताना मीराबाईचा जन्म राजस्थानमधील मेरठ येथे झाला. प्रशंसकांनी लिहिलेल्या तिच्या संतचरित्रानुसार,ही मातृहीन कन्या आजोळच्या घरी लहानाची मोठी झाली.अगदी कोवळ्या वयापासूनच तिला कृष्णाबद्दल खूप प्रेम वाटत होतं.सन १५१६च्या सुमारास किशोरवय संपत असतानाच तिचा विवाह मेवाडचा विख्यात राणा संग याचा पुत्र भोजराज याच्याशी लावून देण्यात आला.तथापि,त्यांचे गुंतागुंतीचे वैवाहिक जीवन जास्त काळ टिकलं नाही.लग्नाला दहा वर्षं होण्यापूर्वीच मीराबाईचा नवरा वारला आणि राजघराण्यातील तिचं स्थानही डळमळलं.सती जाण्यास नकार दिल्यामुळे विधवापणामुळे आपोआपच मिळणारा दर्जाही नाहीसा झाला,परंतु त्रास देणारी स्त्री म्हणून आपली प्रतिमा निर्माण होत आहे,याची तिला तमा नव्हती.तिच्या एका अभंगात तिनं नवऱ्याच्या वारसाला उद्देशून म्हटलंय,"मला ही निंदा,हा कलंक मधुर वाटत आहे.मीरेचा प्रभु तर तो गिरिधर नागर आहे आणि दुष्टदुर्जनच भट्टीत जळणार आहेत." 

मीराबाईचं कृष्णावर उत्कट प्रेम होतं याबद्दल काहीच संशय नाही.तिच्या दैवी प्रियकराच्या विरहदुःखाविषयी तिनं रचलेली गीतं ही तिची महान गीतं समजली जातात.परंतु तिचा आवाज जगाला आव्हान देणारा आवाजही होता यातही काही संशय नाही.सासरचे लोक स्वतःची प्रतिष्ठा राखण्यासाठी आणि ती राजघराण्याची मर्यादा ओलांडते आहे म्हणून तिच्यावर बरीच बंधनं घालू इच्छित होते.परंतु मीराबाईने त्यांच्यापुढे मान तुकवायला नकार दिला.

मीराबाईच्या निधनानंतर लगेचच लिहिल्या गेलेल्या 'नभदास' यांच्या 'भक्तमल' ग्रंथात यातला काही प्रतिकार दिसून येतो.

त्यात हे संत लिहितात,"त्या गिरिधर कृष्णासाठी लोकलाज आणि कुलमर्यादा या दोन्ही गोष्टी मीराबाईने सोडून दिल्या होत्या. तिला कसलीही लाज आणि भीती उरलेली नव्हती. कुणाही समोर ती झुकत नव्हती.फक्त प्रेमाचा मृदंग वाजवत होती." वेगळ्या शब्दांत सांगायचं तर विधवेच्या पोशाखातलं कुणाच्याही समोर न येणारं जीवन जगण्यापासून मीरा दूर होती,तसंच ती पतिव्रतेच्या (म्हणजे पद्मावतीच्या) भूमिकेतही बसत नव्हती.

त्याऐवजी मीराबाई मोकळेपणानं अन्य भक्तांत वावरत होती आणि सहसा जिथं स्त्रियांना जायची परवानगी नव्हती,अशा ठिकाणी जात होती.एवढंच नव्हे;तर तिच्याशी संवाद साधणारे लोक वेगळ्याच प्रकारचे,वेगळ्याच पार्श्वभूमीतून आलेले होते.राजपूत विधवेचे आदर्श सोबती असं नक्कीच त्यांना म्हणता आलं नसतं.

समाजात तिनं तोंडही दाखवायचं नाही असं रूढी सांगत असताना मीराबाईने त्याच्या बरोब्बर विरुद्ध मार्ग निवडला त्यामुळे तिच्या कुटुंबाला अधिकच राग आला.तरीही तिला त्याची पर्वा नव्हती.ती त्याबद्दल म्हणते,"हे राणा,मला तुझी ही विचित्र दुनिया आवडतच नाही.या दुनियेत साधू कुणीच नाहीत,आहेत ते सगळे पाखंडी."


तिच्या या निर्धारामुळे तिच्यावर विषप्रयोग करण्याचाही प्रयत्न झाला,परंतु तरीही ती डगमगली नाही.तिनं आपल्या काव्यात म्हटलं,"राणा, साधुसंतांकडे जाण्यापासून मला कुणी रोखू शकत नाही.लोक काय म्हणतात याची मला पर्वा नाही." सरतेशेवटी,मीराबाईला सर्वांनी वाळीत टाकलं आणि त्यामुळे तिचा निर्धार अधिकच वाढला.


ती गाऊ लागली,"मूरख को तुम राज दियत हो, पंडित फिरत भिखारी." तर अन्य ठिकाणी ती म्हणते, "राणा रागावत असेल रागावू दे,त्याचं राज्य त्याला लखलाभ असो;पण देव रागावला तर मात्र मी कोमेजून जाईन."असं बोलून तिनं आपली निष्ठा कुठे आहे हे दर्शवलं.


ध्रुवदास लिहितात,"पायांत पैंजण आणि हातात चिपळ्या घेऊन ती नाचत होती.हृदयात विशुद्ध भक्ती घेऊन ती अन्य देवभक्तांना भेटत होती,तेव्हा तिला दुनियेचा क्षुद्रपणा कळत होता."तिला खूप काही गोष्टी सोडून द्याव्या लागणार होत्या.

परंतु हृदयाच्या हाकेला ओ देत तिनं ते सगळं तत्परतेने सोडून दिलं.मीराबाई लिहिते,"मी माझं सामाजिक शरीर त्यागलं,

शहरी शरीर त्यागलं,माझं कौटुंबिक शरीर त्यागलं,मला वारसाहक्काने मिळालेली सगळी आभूषणं त्यागली." केवळ कृष्णावरच सगळं चित्त लागल्याने प्रत्येक हानी तिनं घट्ट मनाने सोसली आणि ती लोकांच्यात मिसळून गेली.ती 'त्याची' गाणी गात होती आणि गाता गाता स्वतःचं स्वतंत्र अस्तित्वही राखत होती.


गणिका महात्मा आणि एक इटालियन ब्राह्मण, भारतीय इतिहासातील अज्ञात कहाण्या,मनू.एस.पिल्लई,अनुवाद सविता दामले,मधुश्री पब्लिकेशन


हळूहळू मीराबाई 'प्रवासी संत' बनली.एके काळी जी राजाची राणी होती तिथंच आज ती बहिष्कृता बनली.तिच्या सत्संगाला हजेरी लावणारे लोक बरेच होते;परंतु तिचा मार्ग हलाखी आणि सत्त्वपरीक्षांनी भरलेला होता.भक्तिपरंपरेतील काही लोक तिला आव्हान देत होते किंवा या स्वच्छंद स्त्रीचा फायदा घेण्याचाही प्रयत्न करत होते.पण ती त्यांनाही पुरून उरली.द्वारका येथे त्या शतकाच्या मध्यावर मरतानाही ती स्वतःच्या अटीवर मेली.(दुसऱ्यांच्या इच्छेने पती-चितेवर जळून नव्हे) तिच्या कहाणीने नंतर बऱ्याच लोकांना भारावून टाकलं. महात्मा गांधींना तिच्यात अहिंसक प्रतिकाराचं उदाहरण दिसलं,तर कर्नाटक संगीत गायिका एम. एस.

सुब्बलक्ष्मींनी मीराबाईची धार्मिकता चित्रपटीय पडद्यावर आणली.परंतु त्याचसोबत कुटुंब,विवाह, जात,घराणे,राजपद आणि अगदी भक्तिमार्ग यांच्यासारख्या सामर्थ्यशाली आणि खोलवर रुजलेल्या संस्थांशी संबंधित मूल्यंही मीराबाईने स्वीकारली नाहीत,मानली नाहीत आणि धुडकावून लावली,

हेही तितकंच महत्त्वाचं आहे.तिनं प्रत्येक ठिकाणाहून लादण्यात आलेलं अपेक्षांचं ओझं झुगारून दिलं आणि तिला देवाजवळ घेऊन जाणारं जे जे काही होतं तेच कष्टपूर्वक कवटाळलं. उत्कटता,दोष,नाकारलेपणाची भावना आणि महानता या सगळ्या सगळ्या गोष्टी याही मर्त्य जीवात गुंफलेल्या होत्या तरीही 'मेवाडची मीराबाई' या मनमोहक,

अमर नावाने ती आजमितीलाही स्मरली जाते आहे.


अशा प्रकारे,खरोखरच ती जशी होती,तशीच ती जगली आणि तशीच ती मेली.तिनं त्या एकरंगी पावित्र्याची खाण म्हणून गणल्या गेलेल्या काल्पनिक पद्मावतीच्या पावलांवर पाऊल टाकून दुसरी पद्मावती बनायला नकार दिला.


■■■ समाप्त ■■■



4/21/26

रंगीची गोष्ट / A colorful thing

रंगी ह्या खोलीत पहिल्यांदाच आली होती.तिने आजूबाजूला पाहिलं.एका बाजूला कालीमातेची भव्य मूर्ती,दुसऱ्या बाजूला त्रिशूल,कवटी आणि काही हाडं मांडून ठेवलेली होती.रंगीचं अंग थरथरलं.तिने परत बाबांकडे पाहिलं.बाबा आता हवेत कुणाशी बोलत असल्यासारखे हातवारे करत होते.मध्येच नमस्कार करत होते.सुरुवातीला एकदा तर त्यांनी लोटांगणही घातलं होतं.सुमारे वीसेक मिनिटांनी बाबा शांत झाले. पुढची पाच मिनिटं तसेच डोळे मिटून बसले.मग सावकाश डोळे उघडून खोल आणि धीरगंभीर आवाजात बाबा म्हणाले,

"कालीला रक्त हवंय.ताजं रक्त.मानवी रक्त.लहान मुलाचं रक्त !"

बाबांचा एक एक शब्द खोल गुहेतून आल्यासारखा वाटत होता.रंगीच्या अंगावर सरसरून काटा आला.ती घाबऱ्या आवाजात म्हणाली,"बाबा,पण लहान मुलाचं रक्त मी कुठून आणायचं ?"

बाबांचं रूप पालटलं,ते कडाडले."धन तुला हवंय.मला नाही! नरबली कालीला हवा आहे.ही तिची मागणी आहे.तुला ती मी फक्त सांगितली.काय करायचं ते तुझं तू ठरवायचं आहे.आता तू जा.तुझा विचार झाला तरच उद्या ये.नाही तर धन विसर.मठीत पुन्हा येऊ नकोस."

रंगी चावी दिलेल्या बाहुलीसारखी मठीच्या बाहेर पडली. घरापर्यंत कशी आली ते तिचं तिलाही कळलं नाही. तिच्या मनाला एकप्रकारची बधिरता आली होती.आज कामावर जायचं नाही असं ठरवून ती तरटावर आडवी झाली.थोड्याच वेळात तिचं स्थळकाळाचं भान गेलं. तिला सणसणून ताप भरला.ती कण्डू लागली.रंगीला जाग आली तेव्हा करकरीत संध्याकाळ झाली होती.जराशाने तिने उठून पाहिलं तर खोलीत आणि अंगणातही काळाकुट्ट अंधार होता.आता तिचा ताप उतरलेला होता.सगळं अंग घामाने डबडबलेलं होतं. खूप अशक्तपणा तिला जाणवत होता.तिच्या कानात भैरवनाथबाबांचे शब्द घुमत होते.

"कालीला रक्त हवंय.ताजं रक्त.मानवी रक्त.लहान मुलाचं रक्त !"

तिने त्याच तंद्रीत दिवा लावला.आईने खोलीत दिवा लावलेला पाहिल्यावर बाहेर खेळत असलेला छोट्या घरात आला.आईला बिलगला.त्याला जवळ घेताना रंगीच्या मनात एक विचार चमकून गेला,त्यासरशी तिची तीच दचकली ! 'नाही! नाही!' असं काहीसं पुटपुटत ती मान हलवत राहिली.पण थोड्या वेळाने तिचे डोळे चमकले.तिच्या मनातला गोंधळ संपला होता.तिने पर्याय निवडला.तिला श्रीमंत व्हायचं होतं. तिचा निर्धार झाला. तिने छोट्याला आपल्यापासून दूर केलं.

भैरवनाथबाबांना होकार देताना रंगीच्या मनात शंका होती.ती तिने बोलून दाखवली."महाराज,माझ्या छोट्याला मी कालीमातेला देते आहे पण त्याला त्रास व्हायला नको."

भैरवनाथबाबा गंभीरपणे म्हणाले,"नागेश तुझ्याकडे येऊन मुलगा कालीला विधिवत् अर्पण करील.त्यानंतर पुढचं काली सगळं बघून घेईल.तिला चढवलेला भोगदेखील तुझ्या घरातून तीच नेईल आणि तुझ्या घरात धनदेखील तीच आणील."

रंगीच्या मनातल्या सगळ्या शंका बाबांच्या बोलण्याने फिटल्या.

बाबा पुढे म्हणाले,"योगायोगाने उद्याच अमावस्या आहे.नागेश संध्याकाळीच तुझ्याकडे येईल. मध्यरात्रीपर्यंत पूजाविधी पूर्ण करील.कालीला तिचं भक्ष्य अर्पण करील.'

मठीतून निघताना नागेशने पूजेसाठी काय काय सामान आणून ठेवायचं त्याची यादी रंगीकडे दिली.बाकीचं लागणारं सामान तो स्वतः येताना घेऊन येणार होता.

दुसऱ्या दिवशी संध्याकाळीच नागेश रंगीच्या घरात शिरला,त्याबरोबर रंगीने घाईघाईने खोलीचं दार आतून लावून घेतलं.नागेशने गोड बोलून छोट्याला अफूमिश्रित पेढे खायला दिले.

पहिल्यांदाच असा खाऊ त्याला कुणी देत होतं.आग्रहाने खाऊ घालत होतं.छोट्याही आनंदाने ते पेढे खाऊ लागला.थोड्याच वेळात त्याला गुंगी येऊ लागली आणि तो अर्धबेशुद्धावस्थेत गेला.आता नागेश भराभर कामाला लागला.छोट्याच्या डोक्यावरचे सगळे केस त्याने तासून टाकले.त्याला स्वच्छ आंघोळ घालून नंतर काळ्या रंगाची लंगोटी बांधली.त्याच्या कपाळावर कुंकवाचा मळवट भरला.टाळूवर अगम्य अशा आकृत्या शेंदराने काढल्या.हे करत असताना एकीकडे काही तरी मंत्र तो जोरजोरात म्हणत होता.गळ्यात कवड्यांची माळ घालून,केस मोकळे सोडून,कपाळावर मळवट भरून बसलेली रंगी नागेश सांगेल ती मदत त्याला करत होती.नागेशने खोलीच्या चारी कोपऱ्यांत धूप लावला होता.त्यामुळे खोलीचं वातावरण पार बदलून गेलं होतं. छोट्या मात्र अर्धवट डोळे मिटलेल्या अवस्थेत सगळे सोपस्कार करून घेत होता.त्याला जास्तच झापड आली की,नागेश त्याच्या चेहऱ्यावर हळुवार हाताने थोपटत त्याला जागं ठेवत होता.

नागेशने रंगीने केलेल्या भाताच्या मुदी केल्या.त्यांच्यावर कुंकू,काळे तीळ वगैरे गोष्टी टाकल्या.आता मंत्र म्हणण्याचा त्याचा वेग खूपच वाढला होता आणि हालचालींनाही प्रचंड वेग आला होता.शेवटी त्याने त्याच्या छाटीतून एक छोटं पण अत्यंत तीक्ष्ण असं त्रिशूल काढलं आणि डोळ्याचं पातं लवतं न लवतं तोच छोट्याच्या गळ्यावरून फिरवलं.एक पुसटशी रक्ताची रेघ छोट्याच्या गळ्यावर दिसायला लागली,त्याच लालसर झालेल्या त्रिशूळाने नागेशने भाताच्या मुदींवर त्वेषाने प्रहार केले आणि त्या विस्कटून टाकल्या.आता विधी संपला होता.नागेश घामाने चिंब भिजला होता. छोट्याही श्रमाने आणि गुंगीने आडवा झाला.नागेशने सगळी पूजा एका केळीच्या पानात गोळा केली.रंगीला ते बोचकं गावाबाहेर चौफुल्यावर ठेवायला सांगून तो नेहमीसारखा अंधारात अदृश्य झाला.

आता खोलीत धुपाचा वास,कालीमातेचा फोटो आणि त्यासमोर आडवी ठेवलेली दोन मानवी हाडं एवढंच शिल्लक होतं.रंगीने सुटकेचा निःश्वास सोडला. छोट्याला तसाच झोपलेला ठेवून ते बोचकं घेऊन ती चौफुल्याच्या दिशेने निघाली.बाबूला तिने आज होटेलातच झोप म्हणून सांगितलं होतं.पुढचे पंधरा दिवस गळ्यावरची जखम मिटेस्तोवर आणि डोक्यावर केस येईपर्यंत छोट्याला शाळेतच काय पण घराबाहेरही ती जाऊ देणार नव्हती.जाताना नागेशने एक अफूची पुडी छोट्याला रोज देण्यासाठी म्हणून देऊन ठेवली होती.त्याच्या अमलाखाली पंधरा दिवस तो घरातच गुंगून पडणार होता.आता नागेशचं काम संपलं होतं.आता कालीमाता स्वतःचं काम स्वतःच करील असं त्याने सांगितलं होतं. रंगीला फक्त काही विधी करायचे होते नि मंत्र म्हणायचे होते.त्याने सांगितल्याप्रमाणे दररोज रात्री रंगीच्या खोलीतून हळू आवाजात मंत्राचे आवाज येऊ लागले. त्याची दबक्या आवाजात चर्चा व्हायला लागली.छोट्या पंधरा दिवसांनी घराबाहेर खेळायला म्हणून आला तेव्हा त्याचं एकंदर रूप आणि गळ्यावरची अस्पष्ट अशी खूण बघून लोकांच्या मनात शंकेची पाल चुकचुकायला लागली.त्यातच दर शनिवारी मध्यरात्रीची केस मोकळे सोडलेली एक बाई गल्लीतल्या पिंपळाला फेऱ्या मारते अशी अफवा पसरली.गल्लीतले लोक बाहेर ओट्यावर झोपायला घाबरू लागले.अशाच अवस्थेत दोन महिने गेले.छोट्या हळूहळू खंगू लागला.अशक्त दिसू लागला. गल्लीतल्या भीतीने 'जयजवान मंडळा'च्या स्वयंसेवकांनी गल्लीत गस्त बसवली.

एका शनिवारी दिलीप आणि इतर स्वयंसेवकांना दुरून एक आकृती पिंपळाजवळ दिसली.पण ते धावत तिथे पोहचेपर्यंत ती आकृती नाहीशी झाली होती.तिथे उमटलेल्या ओल्या पावलांच्या ठशांचा वेध घेत ते गेले तर ते ठसे रंगीच्या खोलीपर्यंत जाऊन घांबले होते. दिलीपने दार ठोठावलं.पाचदहा मिनिटं ठोठावूनही दार उघडलं गेलं नाही.नंतर डोळे चोळत चोळत रंगीने दार उघडलं.दिलीप जबरदस्तीने आत घुसला.मोरीत पडलेलं ओलं लुगडं,कोपऱ्यात कालीचा फोटो,त्यासमोरची मानवी हार्ड आणि धुपाचा दरवळ ... दिलीपने रंगीकडे संशयाने रोखून पाहिलं.

"रंगूबाई,हे सगळं थांबवा.परत आम्हाला काही संशयास्पद प्रकार दिसला तर आम्ही सरळ बापूसाहेबांच्याकडे तक्रार करू!"

रात्रभर रंगीला झोप आली नाही.धन मिळेल तेव्हा मिळेल.पण राहतं घर जाण्याची वेळ आता आली होती. नागेशने या व्रता-विधीच्या गोष्टी किती दिवस करायच्या हे सांगितलं नव्हतं आणि आता हे बापूसाहेबांना कळलं तर डोक्यावरचं छप्पर जाईल.

रस्त्यावर यावं लागेल.तसं झालं तर मग काय करायचं? कोण आसरा देईल आपल्याला ? कामंसुद्धा सुटतील. खाणार काय ? छोट्याला शिकवणार कुठल्या जोरावर ? ते काही नाही. हे आता थांबवलंच पाहिजे.दुसऱ्या दिवशी तिने माईंना भेटायचं ठरवलं.रंगीच्या मनातली खळबळ शांत झाली.

सकाळची सगळी कामं आटोपून माई दहाच्या सुमारास गोठ्यात असतात तेव्हाची वेळ त्यांच्याशी बोलायला बरी असं तिला वाटलं.

माई नेहमीप्रमाणे पार्वती-लक्ष्मी आणि नंद्याचं चारापाणी बघत असताना मागचा दरवाजा उघडून कुणीतरी आत आल्याचा आवाज त्यांना आला.माई मागे मान वळवून बघणार तोच तिन्ही जनावरं हंबरू लागली.दावं तोडायला लागली.एवढंच काय,

घाबरून जवळ येणाऱ्या नंद्याला लक्ष्मी शिंगांनी दूर ढकलायला लागली.माईंनी वळून पाहिलं तर दरवाजात रंगी उभी होती!

माईंना रंगीविषयी काही कुणकुण लागली होती.त्यामुळे त्या तिला म्हणाल्या,"रंगे,बरं झालं तूच स्वतःहून आलीस.मी तुला बोलावणारच होते."

माईंचं बोलणं ऐकताच रंगीने हंबरडा फोडला.स्वतःचं पायतण काढून तोंड झोडून घेऊ लागली.माई म्हणाल्या,"हे बघ,तू पुढच्या दरवाजाने येऊन चौकात थांब.मी गुरांना शांत करून येते.तू येताच ही निष्पाप जनावरंपण इतकी अस्वस्थ झाली आहेत की,लक्ष्मी तिच्या गोऱ्हालाही जवळ येऊ न देता शिंगांनी ढकलतेय.जा बरं तू."

गुरांना थोपटून शांत केल्यावर माई चौकात आल्या.रंगी कोपऱ्यात मान खाली घालून उभी होती.तिने रडत रडत सगळी हकिकत सांगितली. ती ऐकून माई थक्कच झाल्या.त्यांच्या कल्पनेपलीकडचं त्यांच्याच मालकीच्या खोलीत घडत होतं अन् त्याचा त्यांना पत्तादेखील नव्हता!माईंना रंगीच्या लोभी स्वभावाचा राग आला आणि कणवही आली.

रंगीला समजावत त्या म्हणाल्या,"रंगे,तुझ्या बाबाने धन मिळेल म्हणून सांगितलं पण किती ते नाही सांगितलं.उद्या एखादा रुपया मिळाला तर ते धनच म्हणायचं.आणि बळदात तेवढंच असणार.आमच्याकडे वाडा आला तेव्हा तो सावकाराकडे गहाण पडला होता.मी घरातलं सोनं विकून तो सोडवला.

तेव्हा बळदात ठेवायला पैसे कुणाकडे असणार होते ? आणि त्या नसलेल्या धनाच्या लोभापायी तू आपला सोन्यासारखा मुलगा बळी देणार होतीस? अगं,आई आहेस की कसाई?"

रंगी माईंच्या पायावर गडबडा लोळायला लागली. माई म्हणाल्या,

"आता फार नाटक करू नकोस.उद्यापासून छोट्यासाठी वाड्यावरून रोज अर्धा शेर दूध पुढचे तीन महिने घेऊन जा आणि आधी तो फोटो अन् ती हाडंबिडं आजच्या आज घराबाहेर काढून गावाबाहेर त्याचा निकाल लावून टाक !"

तीन महिन्यांनतर छोट्या आता छान गुटगुटीत आणि तजेलदार दिसत होता.एके दिवशी माई सकाळी नेहमीप्रमाणे गोठ्यात होत्या तेव्हा रंगी छोट्याला घेऊन आली.तिला पाहून आज लक्ष्मी बिथरली नाही.नंद्यानेही गोंधळ घातला नाही.

छोट्या माईंना नमस्कार करून म्हणाला,"आजी,शाळेत माझा पहिला नंबर आलाय!"

माईंनी त्याच्याकडे कौतुकाने पाहिलं.कनवटीचा एक रुपया काढून त्याच्या हातावर बक्षीस म्हणून ठेवला. छोट्याला खूपच आनंद झाला. रंगीच्याही चेहऱ्यावर समाधान होतं. ती दोघं गेल्यावर माईंनी वळून पाहिलं तर लक्ष्मी नंद्याला वात्सल्याने चाटत होती.

●●● समाप्त ●●●

4/19/26

रंगीची गोष्ट / A colorful thing

बाबूची आई धाकट्या छोट्याला शाळेत नाव घालायला आलेली पाहून चष्म्याच्या वरच्या भागातून रोखून बघत अनुनासिक स्वरात त्यांनी विचारलं, "जन्माचा दाखला कुठाय?"

मागील लेखातून पुढे…

रंगीने पिशवीत जपून ठेवलेला दाखला बाहेर काढला.दाखल्याकडे निरखून बघत गुरुजींनी ड्रॉवरमधून रजिस्टर काढलं.त्यातलं बाबूचं नाव मनातच वाचलं. नंतर रंगीकडे रोखून बघत तीक्ष्ण स्वरात म्हणाले, "दोघांच्या आडनावांत फरक कसा?"

रंगीला उत्तर न सापडल्याने तिने न बोलता मान खाली घातली.जोशीमास्तरांनी किरट्या आवाजात म्हटलं, "अशा परिस्थितीत ह्या मुलाला शाळेत भरती करता येणार नाही!"

रंगी गोरीमोरी झाली.छोट्याचा हात धरून घरी परत आली.जाताना छोट्याने सगळ्या गल्लीत 'साळेमंदी नाव घालाया चाललो'असा गाजावाजा केला होता.त्यामुळे हिरमुसला झालेल्या छोट्याला बघून गल्लीत सगळ्यांना शाळेत घडलेली घटना समजली.दोनतीन दिवस गल्लीत सगळ्या घरात नि मारुतीच्या पारावर छोट्याची शाळेतली अ‍ॅडमिशन आणि जोशी गुरुजींचा आगाऊपणा ह्यावर चर्चा चालू होती.तिसऱ्या दिवशी सकाळीच 'जयजवान मंडळा' ची मुलं वाड्यावर बापूंना भेटायला आली.बापूंच्या कानावरदेखील छोट्याच्या शाळेतील अ‍ॅडमिशनचा प्रकार आला होता.जयजयवानचा आक्रमक अध्यक्ष दिलीप ह्याने बापूंना यासंबंधी काही नियम,काही कायदा आहे का,जोशीमास्तर अशा कारणांनी छोट्याची अ‍ॅडमिशन नाकारू शकतात का,हे विचारून घेतलं.

बापू त्याला म्हणाले,"दिलीप,तिथे जाऊन भांडूबिंडू नकोस ! जोशींना म्हणावं,तुम्ही छोट्याला भरती का करत नाही,त्याची कारणं लेखी द्या.त्यांनी काही लिहून नाही दिलं तर त्यांना सांग,मी भेटायला येणार आहे."

दिलीप आणि जयजवानचे इतर सभासद छोट्याला घेऊन शाळेत गेले."छोट्याला भरती करा नाही तर तसं लेखी द्या आणि अ‍ॅडमिशन नाही दिली तर बापूसाहेब तुम्हाला भेटायला येणार आहेत !"

दररोज संध्याकाळी तालमीत दोन दोन तास कसरत करणाऱ्या त्या मंडळींकडे चष्याच्या वरच्या भागातून बघत गुरुजी नरमाईने म्हणाले,"एवढ्या लहानशा गोष्टीसाठी बापूसाहेबांना कशाला तसदी दिलीत ? उद्यापासून छोट्याला शाळेत पाठवून द्या."

"उद्यापासून कशाला ? छोट्याला बरोबरच आणलं आहे.कुठल्या वर्गात बसवू ते सांगा."

गुरुजींनी दाखवलेल्या दिशेने छोट्याला घेऊन दिलीप आणि बाकी सभासद निघाले.छोट्या तर उड्याच मारत निघाला.जोशी गुरुजींनी रजिस्टर काढून छोट्याच्या नावाची रीतसर नोंद करायला सुरुवात केली.

छोट्याची शाळा सुरू झाली.तो अभ्यासात रमलादेखील पण एक अनपेक्षित अडचण समोर आली.छोट्याला शाळेत घालेपर्यंत गल्लीत गावात कुणालाच त्याच्या आणि बाबूच्या वडिलांच्या नावात-आडनावात फरक आहे हे माहीत असण्याचं कारण नव्हतं.पण छोट्याच्या अ‍ॅडमिशनच्या वेळी मुख्यत्वे जोशीगुरुजींनी हरकत घेतल्यामुळे ते सगळ्यांनाच कळलं होतं.शाळेतली सगळी मुलं येता-जाता दोघांना त्यातल्या त्यात बाबू मोठा असल्याने त्याला चिडवायला लागली.छोट्या लहान होता.त्यामुळे त्याला मुलं कमी चिडवत.शिवाय त्याचा अर्थही त्याला फारसा कळत नव्हता पण बाबूच्या आणि त्याला चिडवणाऱ्या त्या मुलांच्या मारामाऱ्या होऊ लागल्या.त्यापैकी काही कागाळ्या मास्तरांपर्यंत जायच्या.छोट्याच्या अ‍ॅडमिशनच्या वेळी जबरदस्ती केल्याने जोशी मास्तर दुखावले गेले होते.त्याचा राग ते बाबूवर काढायचे आणि त्याला कडक शिक्षा करायचे. आधीच बाबूला अभ्यासात फारसा रस नव्हता.त्यात मुलांचं चिडवणं अन् वरून मास्तरांचा मार.ह्या सगळ्यामुळे बाबूने शाळेत जाणंच बंद केलं.

शाळेत न जाण्याचं कारण रंगीला समजल्यावर ती बाबूला काहीच बोलू शकली नाही.तिने श्रीकृष्ण टॉकीजच्या जवळच्या 'दी नागपुरे टी अँड स्नॅक्स'मध्ये बाब्याला नोकरीला लावून दिलं.बाब्यालादेखील हे काम आवडलं.तो ढोरमेहनत करायला मागेपुढे बघायचा नाही.त्यामुळे होटेलचा मालक जगदीशभाई नागपुरे पण त्याच्यावर खूश असायचा.बाबू पगाराचे सगळेच्या सगळे पैसे आईच्या हातात आणून द्यायचा.त्यामुळे रंगीसुद्धा त्याच्यावर खूश होती.पैसे कमवून संसाराला हातभार लावणारा म्हणून रंगी आता बाबूला जीव लावू लागली.थोड्या दिवसांतच बाबू आणि छोट्याच्या वेगवेगळ्या नावा-आडनावांच्या प्रकरणाचा लोकांना विसर पडला.चिडवणं बंद झालं.छोट्याची शाळा सुरळीत चालू झाली होती आणि बाबूचा पगार नियमित येत होता.त्यामुळे रंगीच्या संसाराच्या गाड्याला वंगण मिळून तो आवाज न करता चालू लागला.गल्लीतल्या शंकराच्या देवळात एक दिवस अचानक एक साधू आला.त्याच्याबरोबर त्याचे दोन शिष्यदेखील होते.

सुरुवातीचे आठ दिवस बाबांचं मौनव्रत होतं.पण देवळात येणाऱ्या लोकांना शिष्यांकडून बाबांची माहिती मिळत होती.बाबांचं नाव भोलेनाथबाबा होतं. हिमालयात पंचवीस वर्षं एका पायावर उभं राहून त्यांनी तप केलं होतं...! सध्या जरी ते जेमतेम चाळिशीचे दिसत असले तरी त्यांचं वय शंभरीच्या जवळपास आहे...! लहानशा गावाला चघळायला नवा विषय मिळाला.बाबांचं मौन संपेपर्यंत त्यांच्याभोवती भक्तांचा घोळका जमला.त्यात स्त्रिया प्रामुख्याने होत्या,सगळ्या जणी रात्री भजनाला जमायच्या.

'चांग फिटला,पांग फिटला,भोलेनाथबाबा मला गुरू भेटला'

अशासारख्या भजनांचे आवाज गल्लीत घुमू लागले. रंगीसुद्धा नियमित जाणाऱ्या भक्तांपैकी एक झाली. शिष्यांनी भक्तांना भोलेनाथबाबांचे फोटो वाटले.इतर भक्तांप्रमाणे रंगीच्याही घरात फ्रेम लावलेला भोलेनाथबाबांचा फोटो लागला.त्याला उदबत्ती लावणंही सुरू झालं.गल्लीतल्या प्रतिष्ठित घरातल्या बायका कुजबुजायच्या - 'करून करून भागली नि देवपूजेला लागली...'

माईंकडे कुणी तरी हा विषय काढला तर त्या म्हणाल्या, “भोलेनाथबाबांबद्दल मला माहीत नाही पण त्यांच्या निमित्ताने रंगी भक्तिमार्गाला लागलीय,हे चांगलंय. भजन,कीर्तनाच्या नावाने चार चांगले शब्द कानांवर पडताहेत,मुखातून बाहेर पडताहेत,हेदेखील चांगलंच आहे!" चारेक महिन्यात भोलेनाथबाबांचा मुक्काम हलला पण तोपर्यंत रंगीच्या मनात त्या तथाकथित बाबाच्या भक्तिमार्गाची वाट चांगलीच रुळली होती. तिच्या त्या भक्तीला प्रत्यक्ष स्वरूप देणारं कोणी नसल्याने ती सैरभैर झाली आणि ह्या अस्वस्थतेच्या काळातच तिला अनकाईच्या डोंगराजवळ राहणाऱ्या अघोरी पंथाच्या भैरवनाथांचं नाव समजलं.रंगी एकदोनदा तिथे जाऊनही आली आणि मग त्यांच्या नादीच लागली.बाबांना भूत-भविष्य चांगलं समजतं... ते थेट कालीमातेशी बोलू शकतात... वगैरे गोष्टी ती भांडी घासायला ज्या ज्या घरी जायची त्या त्या घरांत सांगायची.तिच्या घरातला भोलेनाथबाबांचा फोटो जाऊन आता भैरवनाथबाबांचा फोटो आला. संध्याकाळी त्यांच्या फोटोसमोर धूप लागू लागला. संध्याकाळी महाराजांनी प्रसाद म्हणून दिलेली कवड्यांची माळ रात्रीच्या पूजेच्या वेळी रंगीच्या गळ्यात दिसू लागली.एकदा मठीतून येताना रंगीने भैरवनाथांच्या भजनाची पुस्तकं आणली आणि रात्री ती एकटीच त्यांची भजनं म्हणायला लागली.कधी कधी ती छोट्यालाही आपल्याबरोबर भजनं म्हणायला लावायची.बाबू रात्रीचा सिनेमा सुटल्यावर घरी यायचा म्हणून तो कधी भजनाला नसायचा.हळूहळू रंगीवर भैरवनाथांचा पगडा वाढत गेला.तशा तिच्या मठीच्या फेऱ्याही वाढत गेल्या.

एकदा रंगी मठीत गेली असताना बाबांनी एरवी नेहमी बंद असलेले

डोळे उघडले आणि आपली तीक्ष्ण नजर रंगीवर रोखून ते म्हणाले,

"बेटा,तुझ्या नशिबात भरपूर धनलाभ आहे!"

इतक्या दिवसांत बाबा प्रथमच तिच्याशी बोलले होते.बाबांचं भविष्य रंगीला अशक्य वाटलं.लोकांच्या घरची भांडी घासून आणि पोराने होटेलात काम करून घरी येणारा पैसा म्हणजे धनलाभ असू शकत नाही,एवढं कळण्याइतकी रंगी हुशार होती.रंगीच्या चेहऱ्यावरून आपण सांगितलेल्या भविष्यावर तिचा विश्वास बसला नाही हे चाणाक्ष बाबांनी ओळखलं.

त्यांनी आपल्या पट्टशिष्याकडे निर्देश करत म्हटलं,

"धन कुठून येणार अन् कसं येणार हे हा तुला समजावून सांगेल.त्यासाठी मधूनमधून हा तुझ्या घरी येईल."

बाबांच्या बोलण्यातल्या ठामपणाने भरपूर पैसा मिळण्याची शक्यता आहे असा विश्वास रंगीला वाटला आणि तिचे डोळे चमकले !

बाबांच्या सांगण्याप्रमाणे नागोजी रंगीच्या खोलीवर आला आणि नंतर यायलाच लागला.पहिल्या फेरीतच त्याची घारीसारखी नजर सगळ्या गल्लीवर,वाड्यावर अन् रंगीच्या खोलीत भिरभिरली.दीर्घ श्वास घेत नागोजी म्हणाला,

"येतोय... येतोय... येतोय... पैशांचा आवाज येतोय आणि वासपण येतोय.रंगूबाई,सोन्याची नाणी,चांदी, हिरे-माणकं मोडूंच घबाड दिसतंय.आता फक्त ते कुठे आहे,कसं मिळवायचं,एवढंच बघणं आपलं काम आहे."

नागोजी दिवेलागणीच्या सुमारास यायचा.रंगीच्या खोलीत डोळे मिटून ध्यानधारणा करायचा.भजनाचा कार्यक्रम झाला की,रात्रीच्या अंधारात नाहीसा व्हायचा. काळाकुळकुळीत,कपाळावर शेंदूर फासलेला, कवड्यांच्या आणि वेगवेगळ्या रंगांच्या मण्यांच्या माळा घातलेला,कुरळ्या केसांचं जंगल असलेला फेफट्या नाकाचा नागोजी अतिशय भयानक दिसायचा. बोलताना आपली लांबलचक अन् टोकदार जीभ बाहेर काढून ओठांवर फिरवायची त्याला सवय होती.नागोजी रंगीकडे आला की,त्याला पाहायला गल्लीतली पोरंटोरं आणि कधी कधी मोठी माणसंसुद्धा मुद्दाम खोलीवरून सहज आल्यासारखी आत डोकवायची.पाचसहा भेटींनंतर नागोजी येऊन जेव्हा डोळे मिटून ध्यान करत बसला होता आणि रंगी त्याच्यासमोर हात जोडून भैरवनाथबाबांचा जप करत होती तेव्हा अचानक नागोजीने डोळे उघडले.विस्फारलेल्या डोळ्यांनी तो रंगीला म्हणाला,"सापडलं ! मला सापडलं ! मी प्रत्यक्ष पाहिलं ! दोन हंडे भरून ठेवले आहेत !! जमिनीखालच्या जागेत आहेत. ्इथून फक्त पाचशे फुटांवर आहेत!"

रंगीचं हृदय जोरजोराने धडधडू लागलं.सर्वांगाला घाम फुटला.तिच्या आयुष्यातला सर्वात मोठा भाग्याचा क्षण आला होता.नागोजीने वर्णन केलेलं ते ठिकाण म्हणजे वाड्यातल्या स्वैपाकघरातलं बळद असं रंगीच्या मनाने ठाम घेतलं.तरीच आपल्याला भाई सारं घर सारवायला सांगतात पण स्वैपाकघर मात्र कधीच सारवायला सांगत नाहीत.ते त्या स्वतः सारवतात.तिथे नक्कीच धन असणार.नागोजी म्हणतो.ते खरंच असणार.आता फक्त ते धन कसं मिळवायचं ते ह्या नागोजीबाबाकडून समजून घ्यावं लागेल.कितीही कठीण आणि कडक व्रत असलं तरी ते करावं लागेल.धन मिळवण्यासाठी एवढी साधना तर करायलाच पाहिजे.करू आपण एकदा का धन मिळालं की,मग मोठ्ठा वाडा बांधू.आपण कुणाच्या घरी काम करायला जायचं नाही.आपणच एक नाही दोन दोन बाया कामाला ठेवू.रंगीचे विचार डोक्यात मावेनासे झाले.कानशिलं तापली.कपाळाच्या शिरा इतक्या फुगल्या की,त्या आत्ता फुटतील की काय असं तिला वाटलं. त्तेजित स्वरात तिने नागोजीला विचारलं,

"नागोजी,काय उपासना केली पाहिजे ते लगेच सांग. कसंही करून मला ते धन पाहिजे.गावातल्या बऱ्याच जणांना संशय आहे की,वाड्यातल्या बळदात धन आहे. म्हणूनच तिथून साप अन् नाग निघतात !"

नागोजीने परत डोळे मिटले.काही क्षण स्तब्धतेत गेले. आता त्याला डोळ्यांसमोर काय दिसतंय,तो काय सांगतो हे ऐकायला रंगी अधीर झाली होती.

"रंगूबाई,हे काही माझ्या आटोक्यातलं काम नाही. आता मी निघतो.तुम्ही उद्या मठीवर या.बाबांना शरण जा. बाबाच काय ते तुम्हाला सांगतील."

कपड्यांचा सळसळ आवाज करत नागोजी दार उघडून रंगीच्या खोलीबाहेर पडला.रात्रीच्या काळोखात दिसेनासासुद्धा झाला.रात्रभर रंगीला झोप लागली नाही. सकाळी लवकरच ती मठीवर पोहचली.दोन तास ताटकळत वाट पाहिल्यावर नागोजीने तिला बाबांच्या ध्यानाच्या खोलीत नेलं.बाबांनी मिटल्या डोळ्यांनीच विचारलं,

"आलीस ? म्हटल्याप्रमाणे शोध तर लागलाय. नागोजीने तिथे पाहिलंय हे आम्ही इथे स्थानावर बसून पाहिलंय.आता ते मिळवणं फक्त तुझ्या इच्छाशक्तीवर अवलंबून आहे."

"बाबा,लौकर सांगा.वाटेल ते करायची तयारी आहे माझी !" रंगीच्या आवाजात अधीरता ओतप्रोत भरली होती. बाबांनी व्याघ्रजिनावर पद्मासन घातलं.नागोजीने रंगीला एकदम शांत बसायची खूण केली.

राहिलेला भाग पुढील लेखामध्ये…..★★★




4/17/26

रंगी / colored

नारायणमामा दिवाळीत भाऊबिजेसाठी पुण्याहून आले होते.

बापूंच्या बरोबर ओसरीवर बसून गप्पा मारताना गावाचा आणि वाड्याचा विषय निघाला.नारायणमामांना एखाद्या गोष्टीची उत्सुकता वाटली तर त्याची सविस्तर माहिती ऐकायला आवडत असे,हे माहीत असल्याने बापू त्यांना सविस्तर माहिती सांगत होते -

पेशव्यांच्या काळात ही एक छोटीशी वाडी होती.सगळा भूभाग दुष्काळी होता.शेतकरी कोरडवाहू शेती करून गुजराण करत होते.व्यापारउदीम काहीच नव्हता.

कुठल्याशा लढाईत सरदार विंचुरकरांनी खूप मोठा पराक्रम केला म्हणून पेशव्यांनी त्यांना पाच गावं इनाम दिली.त्यात हा गावसुद्धा दिला.सरदार विंचुरकरांनी आपला प्रतिनिधी म्हणून रघोजी ह्या कर्तबगार माणसाला गावचा पाटील म्हणून नियुक्त केला आणि गाव वसवायला सांगितलं.रघोजीने स्वतःसाठी एक मोठी गढी बांधली आणि तिथून तो गावचा कारभार करू लागला.आजही गावात रघोजी बाबाची गढी आहे.

तिच्यात त्यांचे वंशज राहतात.दसऱ्याच्या दिवशी गावाबाहेरच्या मैदानात शमीच्या वृक्षाची पूजा करायला गाव जमतं तेव्हा अग्रपूजेचा मान आजही गढीवरच्या मंडळींचा असतो.शिवाय दरवर्षी गावात रघोजीबाबांची यात्रासुद्धा मोठ्या दणक्यात साजरी होते.तर,हे रघोजीबाबा मोठे कर्तबगार असावेत.त्यांनी पैठण आणि इतर ठिकाणांहून विणकर आणून इथे वसवले.त्यांना माग काढून दिले.आज हे गाव पैठणीसाठी संपूर्ण राज्यात प्रसिद्ध आहे.रघोजीबाबांनी गुजरात आणि राजस्थानातून व्यापाऱ्यांना निमंत्रण दिलं.ह्या व्यापाऱ्यांच्या पुढच्या पिढ्याही आज गावात समाधानाने राहत आहेत.गावात पाण्याची सोय व्हावी म्हणून गावच्या नगरशेटने गावाबाहेर एक मोठा तलाव बांधला.त्यामुळे गावातल्या जमिनीतल्या पाण्याची पातळी वाढली.आडा-विहिरींना उन्हाळ्यातले काही महिने सोडले तर भरपूर पाणी राहू लागलं.गावाचा व्यापार-उदीम वाढला.इथली रेशमी वस्त्रं शनिवारवाड्यातदेखील जाऊ लागली.गावात पैका आला.साहजिकच इथल्या व्यापाऱ्यांनी,

अंमलदारांनी मोठमोठे वाडे आणि गढ्या बांधल्या.नंतर त्यांच्या पुढच्या पिढ्या नोकरी धंद्यासाठी बाहेरगावी गेल्यामुळे त्यातले बरेच वाडे डागडुजीशिवाय ओसाड पडले.त्याकाळच्या पद्धतीप्रमाणे बऱ्याचशा वाड्यांत बळदं-भुयारं आहेत आणि त्यामुळे त्या संबंधीच्या आख्यायिकाही आहेत.

बापू सांगत होते - "आता आपला वाडा म्हणाल तर तो यशाच्या पहिल्या आईच्या वडिलांकडून माझ्याकडे आला आहे.तो त्यांच्या दोन पिढ्याआधी म्हणजे १८५० सालाच्या सुमारास बांधला गेला असावा." बापूंकडून वाड्याची सविस्तर माहिती ऐकून नारायणमामांच्या शेजारीच कान पाडून ऐकत बसलेल्या यशाच्या मनात वाड्याबद्दल वाटणाऱ्या अभिमानात भरच पडली.यशाला हा बलदंड वाडा मनापासून आवडायचा.बाहेरून दगडी भिंत सगळ्या वाड्याच्या रुंदीला ऐसपैस व्यापणाऱ्या ओट्यानंतर सुरू व्हायची. ओट्याच्या दोन्ही बाजूंना बसण्यासाठी सिमेंटचे कट्टे होते.घराचा मुख्य दरवाजा मजबूत लाकडाचा असून त्यावर उभ्या-आडव्या पट्ट्या मारलेल्या होत्या.त्यांच्या प्रत्येक जोडावर लोखंडी फुलं लावलेली होती. आतमधून दोन्ही बाजूंच्या कोनाड्यात अडसर बसवलेला तर दहा जणांनाही दरवाजा उघडता आला नसता.आत गेल्यावर फरशी टाकलेला चौक होता. त्याच्यावर उजेडासाठी मोठे धारे होते.चौकाच्या वरती थोड्याशा उंचीवर ओसरी होती.तिथे बापूंची बैठक होती.तक्क्याला टेकून चंचीतलं पान खाणाऱ्या बापूंशी सहसा कुळवाडी लोक चौकातच बसून बोलत.शेत कसणारे राधू,विश्वनाथ वरती आले तरी चौकाजवळच्या खांबांना टेकून बसत.बापूंच्या बैठकीवर कुणीच बसत नसत.ओसरीमधून स्वैपाकघरात जाण्यासाठी एक रस्ता देवघरातून जाई तर दुसरा मधल्या बोळीतून स्वैपाकघरात जाई.वाड्याच्या मध्यभागातल्या कोठीच्या आणि बाळंतिणीच्या खोलीनंतरचा भाग मारवाडी कुटुंबाला भाड्याने दिला होता.त्याच्यामागे अंगण.त्यात एका बाजूला आड आणि आंघोळीची प्रशस्त जागा तर दुसऱ्या बाजूला जनावरांचा गोठा आणि कोपऱ्यात संडास.वाड्याच्या बाहेरच्या बाजूला ओट्याला लागूनच एक खोली होती.ती वापरात नव्हती.

नुस्तीच बंद करून ठेवली होती.वाड्याचं वैशिष्ट्य म्हणजे स्वैपाकघरात असलेलं बळद.स्वैपाकघराच्या मध्यभागी ओट्याच्या समोरच बळदात उतरण्यासाठी एक दरवाजा होता.तो उघडला की,जमिनीला एक चौरस खड्डा असून वरती चौकट होती.आत उडी मारून गेलं की,डाव्या बाजूला सुमारे पंधरा फूट लांब,पाच फूट रुंद आणि चार फूट उंचीचं बळद होतं.ते दगडी भिंतींनी बांधलेलं होतं.मात्र बळदाच्या टोकाला एक मातीचा ओटा होता. 

कधीकाळी तो शेणाने सारवला जात होता.ओट्यावर तीन रांजण ठेवलेले लांबूनही दिसत.बळदात खूप सटरफटर सामान वर्षानुवर्षं वेगवगळ्या पूर्वजांनी टाकलेलं होतं.यशाची मोठी बहीण मुंबईत राहत होती. तिचे यजमान श्रीकांत ह्यांना यशा का कोण जाणे 'डॅनी' म्हणे.तर हे डॅनी आणि उषाताई एकदा सुट्टीत गावी आले होते तेव्हा बळदात उतरण्याची टूम निघाली होती.

बळदात धन आहे असा कुटुंबातच नाही तर गल्लीतही सगळ्यांचा समज होता.धन मिळालं की,ते कुणाचा तरी बळी घेतं असाही समज होता.त्यामुळे लेकीचा आणि जावयाचा जीव माई धोक्यात घालू इच्छित नव्हत्या.मरो तो पैसा,माझ्या सोन्यासारख्या जावयाचा न् लेकीचा जीव मला धोक्यात घालायचा नाही असा हेका माईंनी चालवला होता.माईंनी अगदी काकुळतीला येऊन विरोध केला होता पण डॅनींनी हट्टच धरला.ते आणि यशा उडी मारून बळदात उतरले. चारपाच वेळा तर सोबत घेतलेला कंदिल विझला तेव्हा उडी मारून ते जिथे उभे होते,तिथेच उभे राहिले.खाली गेल्या पन्नास वर्षांतली हस्तलिखित स्वरूपातली पंचांगं होती,ती त्या दोघांनी वर काढली.पुढे मात्र खूप अडगळ होती.त्या अडगळीखाली साप-विंचू असण्याची शक्यता होती.म्हणून ते पुढे गेले नाहीत.धूळमाखल्या अवस्थेत परत वरती चढून बाहेर आले.

ह्या बळदाच्या दरवाजाच्या फटीतून कितीदा तरी मोठे मोठे साप बाहेर येत असत.माई ह्या बळदाच्या दाराला मोठे,जड लाकडी पाट टेकवून ठेवत.एक पाट बसायला घेत.एका पाटावर पुढे पोथी ठेवून त्या वाचायला बसत.एकदा अशाच माई पोथी वाचत असताना अशोकभाऊचा मित्र शंकर आला.त्याने पाहिलं तर माईंनी पाठ टेकवलेल्या पाटाच्या वरतीच बळदाच्या फटीतून एका काळ्याभोर सापाचं तोंड बाहेर आलं होतं. त्याची जीभ मधूनमधून बाहेर लवलवत होती.शंकरने प्रसंगावधान राखून माईंना झटकन् पाटासकट बळदाच्या दरवाजापासून लांब ओढलं अन् वाडा एका मोठ्या संकटातून सुखरूप बाहेर पडला.नंतर दोनतीन प्रसंगी बळदातून साप आल्यावर तो दरवाजाच माईंनी मातीने लिंपून टाकला.वाड्याच्या बाहेरच्या बाजूला असलेल्या बंद खोलीवर बऱ्याच जणांचं लक्ष होतं.काही दुकानदारांना त्यांच्या दुकानाचा माल ठेवण्यासाठी गोदाम म्हणून वापरायला ती हवी होती.'

जयजवान मित्रमंडळा'ला कॅरम-पत्ते खेळायला पाहिजे होती.पण बापूंनी अशा कुठल्याही कामासाठी ती जागा देण्याचं नाकारलं.

त्यामुळे बरेच दिवस ती खोली कुलूप लावून बंद होती.वाड्याच्या बाहेरच्या बाजूला स्वतंत्र अशी ती जागा असल्याने तशी ती खोली दुर्लक्षितच होती.एक दिवस सकाळी मागच्या अंगणातल्या गोठ्यात पार्वती-लक्ष्मीला चारा घालण्याचं काम माई करत होत्या.सवयीप्रमाणे माईंच्या त्या दोघींशी गप्पा चालू होत्या.

तेवढ्यात रंगूबाई बाबू आणि छोट्या या तिच्या लहान मुलांना घेऊन वाड्याच्या मागच्या बाजूच्या दरवाजाने आत आली.रंगूबाई दोन घरी भांडी घासण्याचं काम करी.तिचा उल्लेख सगळे जण रंगी असाच करीत. रंगी पस्तिशीची,काळीसावळी पण नाकीडोळी नीटस अशी होती.तिच्या नाकात चमकी होती.रंगी म्हणजे आपल्या ऐन तारुण्यात बिनधास्त वागणारी तरुणी असावी.कारण तिच्या दोन्ही मुलांच्या वडिलांची नावं आणि आडनावं वेगवेगळी होती.रंगी आली त्यावेळी माई लक्ष्मीला थोपटत तिच्याशी बोलत होत्या.ती तिच्या गोऱ्ह्याला-नंद्याला चाटत होती नंद्या तिला लाडाने दुशा देत होता."बायो,तुझं पोरावर भारीच प्रेम.पण त्या नादात चारा खाण्याकडे दुर्लक्ष कशाला करतेस?" माई लक्ष्मीकडे कौतुकाने पाहत म्हणत होत्या.रंगीने हे वाक्य ऐकलं.माईंचं आपल्याकडे लक्ष वेधण्यासाठी ती थोडीशी खाकरली."काय गं रंगे,काय काम काढलंस? आणि अगदी पोरांसकट आलीसशी ?"

माईंच्या प्रश्नावर रंगीने तिचं काम सांगितलं.रंगीला गावाबाहेर राहत असलेल्या खोलीच्या मालकाने जागा रिकामी करायला सांगितलं होतं.त्याला वापरायला जागा कमी पडत होती म्हणे.त्यामुळे तिला वाड्याबाहेरची रिकामी आणि बंद असलेली खोली मिळाली तर हवी होती."माई,ह्या दोन पोरांना घरी सोडून दिवसभर कामाला यावं लागतं.माझी सगळी कामं इथली गल्लीतलीच हायत.त्यामुळे माझी चांगली सोय होईल." रंगीला मध्येच थांबवत माईंनी म्हटलं,"बापूंना विचारून सांगते. पण हे बघ रंगे,हा पोरीबाळींनी भरलेला वाडा आहे. थोडं जरी वावगं वागणं लक्षात आलं तर सोन्याला सांगून त्याच दिवशी तुझं सामान खोलीच्या बाहेर फेकून दिलं जाईल." रंगी खाली मान घालून म्हणाली,

"माईसाहेब,गेले ते दिवस.अन् देवळात,देवाच्यासमोर वंगाळ वागनं काय, पन वंगाळ इचार पन कुनी करतं काय ? तुमी बापूंकडं माझ्या पोरांकडं बघून सबुद टाका." "बरं." नंद्याला थोपटत माई म्हणाल्या.

यथावकाश रंगी तिच्या पोरांसकटत्या खोलीत राहायला आली आणि खोलीचं रंगरूपच पालटलं.खोलीची बाहेरची भिंत तिने लिपून काढली.त्याला चुना मारला. छोटंसं अंगण सारवल्याने स्वच्छ दिसू लागलं.बाबू आणि छोट्या गल्लीतल्या पोरांबरोबर भवरा,गोट्या वगैरे खेळायला लागले.ठकूबाई कामावर काही कारणांनी आल्या नाहीत तर रंगी वाड्यावर भांडी घासायला येऊ लागली.महिनापंधरा दिवसांतून एकदा स्वैपाकघर सोडून इतर खोल्या आणि ओसऱ्या शेणाने सारवायचं काम रंगीच नियमित करू लागली.स्वैपाकघर मात्र माई स्वतःच सारवायच्या.रंगी तरतरीत होती.बोलण्यात चतुर होती आणि महत्त्वाकांक्षीदेखील होती.वाड्यातल्या मुली ओट्याच्या कट्ट्यावर गप्पा मारत बसल्या की, आपल्या मोरीत भांडी घासता घासता त्या गप्पांमध्ये रंगीही सामील व्हायची.एक मात्र खरं की,तिच्या पूर्वीच्या आयुष्याबद्दल जे ऐकलं होतं त्याचा मागमूसही आता कुणालाच दिसला नव्हता.

पहाटेच्या अंधारात ती बाहेरच्या मोरीत आंघोळ करून घेई.उजाडताच पोरांना उठवी.मोठा बाबू आता गल्लीतल्याच मराठी मुलांची शाळा नं.२ मध्ये पाचवीच्या वर्गात जाऊ लागला होता. बाबू अभ्यासात यथातथाच होता.त्याचं अभ्यासात लक्ष नव्हतं.

काळ्या रंगाचा आणि पसरट नाकाचा बाबू त्याच्या निस्तेज डोळ्यांनी मख्खपणे तासन्तास कुठे तरी शून्यात बघत राही.छोट्या मात्र तरतरीत होता. गल्लीतली मुलं मारुतीच्या पारावर अभ्यास करत बसली की हा तिथे टक लावून बघत उभा राही. पुढच्याच वर्षी तो पहिलीत जाणार होता पण ऐकून ऐकून त्याचे दहा एके दहापर्यंतचे पाढे पाठ झाले होते. रंगी त्याला जवळ घेऊन म्हणे,"छोट्याला मी लई शिकिवनार ! शिकशील का न्हाई रे छोट्या ?" आईला खूश करण्यासाठी आणि तिच्यावर जास्त प्रभाव टाकण्यासाठी मग छोट्या बे एके बे मोठ्या आवाजात सुरू करायचा.

आईला म्हणायचा,"व्हय आये.म्या लय शिक्नार.यशादादासारकं साळामंदी जानार,विंग्रजी शिक्नार.यस फेस ठेस करनार!"

गावगोत,अष्टगंध प्रकाशन,माधव सावरगांकर

रंगी त्याला आणखीच जवळ ओढून घेत कुरवाळत राही.नवीन शैक्षणिक वर्ष सुरू व्हायची वेळ झाली.रंगी छोट्याचा जन्मदाखला घेऊन जोशी गुरुजींकडे गेली. जोशी गुरुजींना शाळेतल्या सगळ्या मुलांची नावं पाठ होती.बाबूची आई धाकट्या छोट्याला शाळेत नाव घालायला आलेली पाहून चष्म्याच्या वरच्या भागातून रोखून बघत अनुनासिक स्वरात त्यांनी विचारलं, "जन्माचा दाखला कुठाय?"

■■■ अपूर्ण शिल्लक भाग पुढील दोन भागात प्रकाशित होईल.■■■

4/15/26

बर्फाळ बेटावरचा संघर्ष Clash on the Ice Island

आता कॅम्पवर नाइट आणि अ‍ॅडा दोघंच उरतात.एक नवी लढाई सुरू होते.सुरुवातीचे काही दिवस नाइट उसना जोर आणून काम करतो;पण लवकरच त्याचं अवसान ओसरतं आणि त्याची प्रकृती झपाट्याने ढासळू लागते.एकदा बाहेर लाकडं आणण्यासाठी गेलेला असताना तो बर्फातच पडून राहिलेला अ‍ॅडाला दिसतो.त्याची शुद्ध हरपलेली असते.त्याला जागं करून अ‍ॅडा कसंबसं त्याला कॅम्पवर आणते.पण तेव्हापासून तो अंथरुणला खिळतो तो खिळतोच.नाइट मेला तर आपलं काय,हा भयकारी विचार अ‍ॅडाचा ताबा घेतो आणि आधी त्याच्यापासून चार हात लांब राहणारी अ‍ॅडा.त्याच्या शुश्रूषेला वाहून घेते.आता सगळी कामं तिच्यावरच येऊन पडतात.बाहेर लावलेल्या सापळ्यांमध्ये एखादा प्राणी अडकला आहे का ते पाहणं,लाकडं गोळा करणं,स्वयंपाक करणं,भांडी घासणं,पिण्याच्या पाण्यासाठी बर्फ गोळा करणं आणि आणखी शंभरशे साठ कामं.मधूनच सापळ्यात अडकलेला एखादा कोल्हा सोडला तर शिकार जवळपास नसतेच.त्यांच्याकडे असलेले खाद्यपदार्थ कसेबसे पुरवत नाइट आणि अ‍ॅडा तीन महिने काढतात. प्रत्येक दिवस अंगावर काटा घेऊन उगवत असतो; आजच्यापेक्षा कालचा बरा होता,असं वाटायला लावत असतो.आता नाइटला उठणं तर लांबच,जागच्या जागीदेखील हालचाल करणं शक्य होईनासं होतं.पुढे काय होणार याची चिन्हं दिसू लागतात;पण अ‍ॅडा तो विचारही मनात आणायला तयार नसते.रँगल बेटावर एकट्याने राहणं ही तिच्यासाठी अशक्य कोटीतली गोष्ट असते.धीर धरून ठेवण्यासाठी ती नवी युक्ती काढते.बेटावर आल्यापासून ती सर्वांना रोजनिशी लिहिताना पाहत आलेली असते. अगदी मरणासन्न अवस्थेतही नाइट आपल्या डायरीत काही तरी खरडत असतोच.आपणही डायरीत नोंदी केल्या नाहीत तर बाकीचे तिघं गेल्यावर आपण कोणत्या परिस्थितीत दिवस काढले हे कुणालाच कळणार नाही याची जाणीव अ‍ॅडाला होते.त्यामुळे ती स्वतःला नोंदी लिखाणात गुंतवून घेते.जसजशी नाइटची प्रकृती खालावू लागते,तसा धीर सुटून तो अ‍ॅडाला अद्वातद्वा बोलू लागतो,शिव्या देऊ लागतो.खरं तर 

अ‍ॅडा हा त्याचा एकमेव आधार असतो.तीच त्याची शुश्रूषा करत असते,त्याला जास्तीत जास्त खायला मिळावं यासाठी धडपडत असते;पण स्कर्व्हीने ताबा घेतल्याने नाइट हे सगळं समजण्याच्या पलीकडे गेलेला असतो.पण स्वतःच्या स्वार्थापोटी अ‍ॅडा त्याही स्थितीत तो जिवंत राहावा यासाठी प्रयत्न करत राहते.

मे महिना उजाडतो.आसपास अ‍ॅडाला काही पक्षी दिसू लागतात.ते पकडण्यासाठी ती जंग जंग पछाडते.१० मे. त्या दिवशी अ‍ॅडाचा पंचविसावा वाढदिवस असतो;पण एखादा जास्तीचा पावाचा तुकडा आणि बड्या मुश्किलीने पकडलेल्या पक्ष्याचं मांस यावरच तो साजरा होतो.नाइटच्या तब्येतीत अजूनही सुधारणा नसतेच. आणखी एक महिना याच संघर्षात जातो. हळूहळू अ‍ॅडाला पक्ष्यांची शिकार जमू लागते.पण पक्षी असतातच किती? सहा जूनला नाइटचा तिसावा वाढदिवस असतो;पण तो दिवस उगवतो नाइटचा मृत्यू जवळ असल्याची बातमी घेऊनच.आज की उद्या? रात्री की दिवसा? नेमका कधी,एवढाच आता प्रश्न असतो. रोज सकाळी जाग आल्यावर नाइटपाशी येऊन पाहताना अ‍ॅडाचं काळीज लकलकत असतं.२१ जूनला नाइट पुन्हा एकदा बेशुद्ध पडतो.त्याचे रागरंग काही ठीक दिसत नसतात.अ‍ॅडा त्याला उठवण्याचा प्रयत्न करत राहते.रडत-भेकत राहते.'प्लीज मला एकटीला सोडून जाऊ नकोस',असं म्हणत आक्रंदत राहते.थोड्या वेळाने नाइट डोळे उघडतो आणि आपण आता ठीक असल्याचं अ‍ॅडा ला सांगतो;पण तो ठीक नाही हे आता उघड असतं.त्या रात्री अ‍ॅडा घाबरतच झोपी जाते. सकाळी उठून ती आधी नाइटच्या बिछान्याकडे धाव घेते.तिची भीती खरी ठरलेली असते.त्याचा श्वासोच्छवास थांबलेला असतो.रात्रीतून कधी तरी नाइटचे प्राण गेलेले असतात.आता पुढे काय ?अ‍ॅडाला पहिली गोष्ट आठवते ती म्हणजे नाइटच्या मृत्यूची नोंद करायला हवी.गेल्या काही दिवसांपासून तिने गेलचा टाइपरायटर वापरायला सुरुवात केलेली असते.त्यात नवीन कागद घालून ती नाइटच्या मृत्यूची तारीख व वेळ नोंदवून ठेवते.

नाइटचा मृतदेह तिथून हलवणं अ‍ॅडासाठी अशक्य असतं.त्याला उचलण्याएवढी शक्ती तर तिच्या अंगात नसतेच,पण त्याच्यावर अंत्यसंस्कार करून बेटावरची उरलीसुरली मानवी सोबत नष्ट करण्याचं धाडसही तिच्यात नसतं. मेलेल्या का असेना पण माणसाची सोबत तिला हवी असते;पण मृतदेहासोबत त्याच खोलीत राहणं शक्य नसल्याने ती आपला मुक्काम स्टोअररूममध्ये हलवते.

आता मात्र अ‍ॅडा पूर्ण एकटी पडते.हजारो चौरस किलोमीटरच्या बेटावर पूर्ण एकटी.तिच्या डोक्यात हाच एक शब्द सतत घुमत राहतो.त्यातून बाहेर पडण्यासाठी ती स्वतःला रोजच्या कामात अडकवून घेते.जणू नाइट मेलाच नाही,असं मानून ती आधीचंच रूटिन चालू ठेवते.अगदी रोज संध्याकाळी आज दिवसभरात काय काय केलं ते नाइटला येऊन सांगण्यासकट.सकाळी खाणंं धुंडाळण्यासाठी बाहेर पडण्याआधी टाइपरायटरवर बसायचं आणि दिवसभर आपण काय काय करणार आहोत,कुठे कुठे जाणार आहोत,कधी परतणार आहोत याची नोंद करून ठेवायची.न जाणो चुकून-माकून नेमके आपण कॅम्पपासून लांब गेलेलो असताना जहाज आलं आणि आपल्याला न घेताच परत गेलं तर?सकाळी बाहेर पडून किनाऱ्यापर्यंत जायचं आणि गोठलेल्या समुद्राकडे बघत बसायचं,हा तिचा एकमेव विरंगुळा बनतो.न जाणो आपण अशी वाट पाहत असतानाच क्षितिजावर आपली सुटका करायला आलेलं जहाज दिसेल,अशी दिवास्वप्नं तिच्या मनात रेंगाळत असतात.याच किनाऱ्यावर त्यांची स्किन बोट लाब्लेली असते.बेटाला वळसा घालून बेटावरच्याच दूरच्या ठिकाणी जाण्यासाठी मोहीमवीर या बोटीचा वापर करत असत.अ‍ॅडानेही ही बोट एक-दोनदा वापरलेली असते. पण प्रत्यक्ष कुठे जाण्यापेक्षा ही स्किन बोट म्हणजे अ‍ॅडाच्या दृष्टीने मानसिक आधार असतो.या बेटावरून आपली सुटका होऊ शकते,असं त्या बोटीकडे पाहून तिला वाटत असतं.एके दिवशी सकाळी शिरस्त्याप्रमाणे अ‍ॅडा किनाऱ्यावर येऊन पाहते,तर बोट गायब.रात्रीतून सुटलेल्या सोसाट्याच्या वाऱ्यात बोट वाहून गेलेली असते.ते पाहून अ‍ॅडाचं अवसानच गळतं.त्या बोटीचा खरं तर तिला काहीही उपयोग नसतो.ती बोट घेऊन अ‍ॅडानोमला पोहोचू शकत नसते;पण तरीही नाइट गेल्यावर जसं भयाण,एकाकी वाटलं होतं तसंच तिला आत्ताही वाटतं.सलग दोन दिवस अ‍ॅडा त्या दुःखात बुडून राहते,रडत राहते.ना शिकारीसाठी बाहेर पडते,ना लाकडं गोळा करायला.पण लवकरच तिच्या लक्षात येतं,की हात-पाय हलवले नाहीत तर आपण खंगून मरू,बाकी काहीही घडणार नाही.मुलासाठी तरी आपल्याला जिवंत राहण्याचा प्रयत्न करायला हवा. स्वतःची कीव करून काहीही उपयोग नाही.एका क्षणी ती ठरवते की स्किन बोट पुन्हा तयार करायची.ही बोट चौघा मोहीमवीरांनी तयार केलेली असते.अ‍ॅडाने फक्त ती तयार होताना पाहिलेलं असतं.

पण आता ती इरेला पेटते.जणू तिचं जीवन-मरण त्या बोटीवरच अवलंबून असतं.कित्येक दिवस खपून,चुकत माकत अखेर ती पूर्ण निरुपयोगी बोट तयार होते,तेव्हा कुठे अ‍ॅडा सुटकेचा निःश्वास सोडते.पण हे काम संपल्यावर रँग्लर बेटावरचं एकाकीपण पुन्हा तिला घेरून येतं.वाऱ्याच्या आवाजाशिवाय तिथे सारं काही निःशब्द असतं.अ‍ॅडा काम करत असताना होणारा आवाज,

टाइपरायटरची किटकिट आणि मोहिमेतल्या मांजरीशी अ‍ॅडाने मारलेल्या गप्पा,एवढेच काय,ते आवाज.ही मांजरच आता अ‍ॅडाची एकमेव साथी असते.तिच्यासोबत अ‍ॅडा सुखदुःखाच्या सगळ्या गोष्टी बोलत राहते.तिच्या बोलण्यात मुख्य दोनच विषय असतात एक, तिचा मुलगा आणि दुसरा,नोमच्या दिशेने जाण्यासाठी बाहेर पडलेले तिघे मोहीमवीर.आतापर्यंत ते नोमला पोहोचले असतील आणि लवकरच जहाज घेऊन आपल्या सुटकेसाठी इकडे येतील अशी तिला खात्री वाटत असते.वाटेत त्यांचं काही बरंवाईट झालं असेल, हा विचार मनात आणण्याचीही अ‍ॅडाची तयारी नसते.

अ‍ॅडाडाला आता शिकार जमू लागलेली असते. दोन-चार दिवसांनी एखादा पक्षी पकडण्यात तिला यश येत असतं.किंवा कधी तरी एखादा सीलही तिच्या जाळ्यात गावत असतो.पण प्राण्यांची संख्याच अजून तुटपुंजी असते.आणि खाण्याचा साठा तर जवळपास संपत आलेला असतो. २० ऑगस्टला ती आपल्याकडचा शेवटचा बिस्किटांचा पुडा फोडते.ही बिस्किटं संपली की तिला फक्त शिकारीवरच अवलंबून राहणं भाग असतं.क्रॉफर्ड आणि कंपनी आपल्याला घेण्यासाठी येईल का याबद्दल तिला अचानक शंका वाटू लागते.ते आले तरी त्याआधीच आपण उपासमारीने मरणार असं तिला वाटू लागतं.आपलं मरण इथेच लिहिलेलं आहे असं ती मनाने घेते.

... योगायोग म्हणजे नेमक्या त्याच दिवशी स्टीफन्सनने पाठवलेलं डोनाल्डसन हे जहाज घेऊन नॉइस हा खलाशी रँगल बेटावर पोहोचतो.बेटाला वळसा घालूनही त्याला कोणतीच मानवी चाहूल दिसत नाही.एका ठिकाणी त्याच्या सहकाऱ्यांना मोहीमवीरांचा जुना कॅम्प दिसतो;पण तिथे चिटपाखरूही नाही,हे पाहून त्यांची निराशा होते.या बर्फाळ बेटावर दोन वर्षं तग धरून राहणं अशक्य आहे असं नॉइसला आधीपासूनच वाटत असतं.बेटावरचा सन्नाटा पाहून तो विचार आणखीच बळावतो.बेटाला वळसा घालत एकदा दुर्बिणीतून पाहणी करायची आणि परत फिरायचं असं ते ठरवतात. त्यातल्या एका दुर्बिणीमध्ये अचानक एक मानवी आकृती चालताना दिसू लागतो.ती अ‍ॅडा असते.

जगण्याची आशा सोडून दिल्यानंतर तिच्या पुढ्यात अचानक माणसं येऊन ठाकतात.अ‍ॅडाचा खडतर संघर्ष अखेर यशस्वी झालेला असतो.

खरं तर अ‍ॅडा रँगल बेटावर गेलेली असते ती मोहीमवीरांना सहायक म्हणून;पण प्रत्यक्षात अ‍ॅडासोडून इतर साऱ्या मोहीमवीरांचा दुःखद शेवट होतो. नाइट आणि अ‍ॅडाला मागे ठेवून नोमच्या दिशेने गेलेल्या क्रॉफर्ड,मॉरर आणि गेल या तिघा मोहीमवीरांचा अखेरपर्यंत कुणालाही पत्ता लागत नाही.मानवी वस्तीवर पोहोचण्याआधीच टोकाच्या प्रतिकूल वातावरणाने त्यांचा बळी घेतला असणार हे उघड असतं.रँगल बेटावरून सुखरूप सुटका झाल्यावरही अ‍ॅडाच्या आयुष्यातला संघर्ष संपत नाही. 

मोहीमवीरांपैकी ती एकटीच बचावलेली असल्याने बेटावर काय घडलं हे सांगू शकणारी ती एकमेव व्यक्ती असते.त्यामुळे तिच्या कथनावर शंका व्यक्त केली जाते. तिच्यावर नाइटचा खून केल्याचा आरोपही केला जातो. पण ती मात्र ते सारं सहन करून या चारही मोहीमवीरांच्या घरी जाऊन,त्यांच्या कुटुंबीयांशी बोलून त्यांच्या शेवटच्या दिवसांची हकीगत त्यांना सांगते.आता आपली सुटका झाली,असं त्यानंतरच तिला वाटतं.

अ‍ॅडा ब्लॅकजॅक पुढे अमेरिकेतच स्थायिक होते. १९८३ साली वयाच्या ८५व्या वर्षी तिचं निधन होतं.अ‍ॅडा चा मुलगा बिली ब्लॅकजॅक जॉन्सन याच्या मुलाखती घेऊन आणि अ‍ॅडा च्या डायरीसह रँगल मोहिमेतील अनेक कागदपत्रांचा अभ्यास करून लेखिका जेनिफर निवेन हिने ‘अ‍ॅडा ब्लॅकजॅक : टू स्टोरी ऑफ सर्व्हयव्हल इन द आर्क्टिक' हे पुस्तक लिहिलं. ते २००३ साली प्रकाशित झालं.याशिवाय अ‍ॅडावर आणखीही काही पुस्तकं आणि असंख्य लेख लिहिले गेले आहेत.

◆◆◆ समाप्त ◆◆◆