* विजय गायकवाड | Vijay Gaikawad

live

नमस्कार आपले स्वागत आहे. मी पुस्तके आणि मित्रांवर पैसे खर्च करतो,माझ्याकडे दगड आणि विटांवर खर्च करण्यासाठी पैसे नाहीत.- रस्किन बाँड.ही थोर माणसं व त्यांचे विचार मला पुस्तकात भेटलीत.ती भेटली आणि त्यांनी सांगितले कि, प्रत्येक दिवशी असं काही तरी करा की,ते तुम्हाला अधिक सुंदर उद्याच्या दिशेने खूप लांबवर घेऊन जाईल."- डोग फायरबाऊ.' सर्वियन कादंबरीकार मिलोराद पावीच यांचे एक वाक्य आहे ते म्हणतात - जोवर जगात पुस्तक वाचणाऱ्या वाचकांची संख्या बंदूकधारी सैनिका पेक्षा अधिक आहे तोवर काळजीच काहीच कारण नाही.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात.पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये.म्हणून अविरतपणे प्रयत्न करणारे मार्गदर्शक, मित्र धावून येतात.प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,डॉ.दीपक शेटे,आ.भरत बुटाले,प्रा.सर्जेराव राऊत,सुभाष ढगे,अनिल फारणे,डॉ.सुधीर सरवदे ,विश्वास खाडे, विनायक पाटील,संजय कुंभार,सतीश खाडे,मनोहर सुर्वे,गणेश खंदारे,तात्या गाडेकर, दादासाहेब गाडेकर, दादासाहेब ताजणे, पुस्तकातील घटना प्रसंग सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील यांनी केलेले आहे. मला लिहिण्याची प्रेरणा देणारी पुस्तके,लेखक,प्रकाशक,मित्र ही जगावेगळी माणसं माझ्या जीवनातील महत्वाचा टप्पा आहेत.... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ.मेघा गायकवाड, चिरंजीव मयान,माझ्या धावण्यातील गुरुवर्य नामदेव बरुरे,लुल्ला शेख मोठी ताई ,लहान ताई जयश्री शिंदे या सर्वांचेच मनापासून आभार व धन्यवाद मॅट्रिक फेल विजय गायकवाड

5/7/26

तरुण मुलीची सत्यकथा / True story of a young girl

त्या रात्री ज्युलियनला गाढ झोप लागते. रात्रीतून किती किडे अंगावर वळवळले असतील, कोणते प्राणी आसपास फिरून गेले असतील याचा विचार करण्याचंही ती टाळते. बहुतेक अजूनही तिच्यावरच्या धक्क्याचा परिणाम पुरता ओसरलेला नसतो. सकाळी उठून ती पुन्हा चालू लागते. चालताना अनेकदा तिला धोकादायक किडे दिसत असतात. एके ठिकाणी पक्ष्याला गिळंकृत करू शकणारा एक मोठा विषारी कोळी तिला दिसतो. धोका वाटला तर माणसावरही हल्ला करणारा तो कोळी असतो. पण नशिबाने तो झऱ्याच्या दुसऱ्या बाजूला असतो. ज्युलियन आणि तो दोघंही एकमेकांकडे बघतात आणि आपापल्या दिशेने चालू लागतात.खूपदा ज्युलियनला आकाशातून विमानांचे आवाजही ऐकू येत असतात.

बचावकार्यासाठी घिरट्या घालणारं विमान असावं असं ती ताडते; पण झाडांच्या दाटीतून तिला विमान दिसणं शक्य नसतं, मग विमानातून ती दिसणं तर लांबच राहिलं. पण तरीही विमानाचा आवाज ऐकू आल्यावर ती खच्चून ओरडून घेते.

आपला आवाज या झाडांच्या टोकांपर्यंत पोहोचणंही शक्य नाही हे माहिती असूनही. कदाचित जसजसा हा झरा मोठा होत जाईल आणि त्याचं रूपांतर नदीत होईल तिथे कदाचित जंगलही कमी झालेलं असेल आणि विमानातून खालचा भाग दिसू शकेल. तोपर्यंत आपल्याला चालत राहण्याशिवाय पर्याय नाही, अशी खूणगाठ बांधून ज्युलियन चालत राहते.

पायपिटीचे पहिले दोन-तीन दिवस ज्युलियन जास्त विचार न करता यांत्रिकपणे चालत असते. अजूनही तिची बधिरावस्था पूर्ण संपलेली नसते. अधूनमधून तिच्या मनात आईचा विचार डोकावत असतो; पण आतापर्यंत नक्कीच आईची सुटका झाली असेल असं मानून ती सारे विचार मनातून बाजूला काढून टाकते. झऱ्याकाठाने चालत राहणं एवढंच आपलं सध्याचं काम आहे असं जणू या परिस्थितीने तिला सांगितलेलं असतं.

चौथा दिवस थोडा वेगळा उजाडतो. दुपारच्या वेळेस तिला एक कर्कश आवाज ऐकू येतो. तो ऐकून पहिल्यांदाच ज्युलियन भीतीने गोठून जाते. आवाजावरूनच ती ओळखते की हा भल्या मोठ्या गिधाडांचा आवाज आहे. एवढ्या जवळ गिधाडं आहेत याचा अर्थ कुठे तरी मोठ्या प्रमाणावर मांस आहे हे उघड असतं. तिच्या मनात येतं, या गिधाडांचं इथे येण्याचं कारण माझी आईच असेल तर ? थोड्याच वेळात तिला गिधाडांचं अन्न दिसू लागतं. विमानातल्या तीन आसनी खुर्चीवर तीन मृतदेह वेड्यावाकड्या अवस्थेत पडलेले असतात. जमिनीत घुसलेली तोंडं आणि आकाशाच्या दिशेने उंचावलेले पाय. त्या तिघांमधली एक बाई असते. ती आपली

आई तर नसेल ना, या विचाराने ज्युलियन सुन्न होऊन जाते. त्या ठिकाणाहून पळून जावं अशी इच्छा तिचा ताबा घेते, पण शहानिशा करण्याशिवाय पर्याय नसतो. जवळ जाऊन बघते तर तिला त्या बाईच्या पायाची रंगवलेली नखं दिसतात. ती सुटकेचा निःश्वास टाकते. आई कधीच नखं रंगवत नाही, हे तिला माहीत असतं. पण त्या दृश्यामुळे तिची बधिरावस्था थोडीशी कमी होते. आपल्या आईचं काय झालं असेल, हा विचार तिच्या मनाचा ताबा घेतो. आई सुखरूप असणार, असं स्वतःला बजावत ती चालत राहते.आता ज्युलियनकडच्या कँडीही संपलेल्या असतात. पावसाळा असल्यामुळे कुठल्याच झाडाला फळं नसतात.पामचा गर वगैरे खावा म्हटलं तर तो काढण्यासाठी तिच्याकडे सुरी नसते. जंगलातल्या बहुतेक गोष्टी विषारी असल्यामुळे कुठलाही धोका पत्करायला ती तयार नसते. त्यामुळे झऱ्यातलं माती मिसळलेलं गढूळ पाणी पिऊन पोट भरण्याशिवाय आता दुसरा पर्याय नसतो,पण जिथे मानवी वस्ती नाही तिथलं पाणी पिण्यात फारसा धोका नाही एवढं ज्युलियनला माहिती असते. बहुधा ते पाणी प्यायल्यामुळेच तिला भुकेचीही फारशी जाणीव होत नाही ही त्यातल्या त्यात चांगली गोष्ट.पण तिच्या शरीरातली ताकद मात्र झपाट्याने कमी व्हायला लागलेली असते.

पाचव्या किंवा सहाव्या दिवशी तिला एका ओळखीच्या पक्ष्याचा आवाज येतो.पाण्याच्या मोठ्या साठ्याजवळ आढळणाऱ्या या पक्ष्याचा तिच्या आईने सखोल अभ्यास केलेला असतो.

पाण्याजवळ आढळत असल्याने त्याच्या आसपास मानवी वस्तीही असू शकते,असं वाटून आपला एरवीचा बेफिकीर मूड बाजूला ठेवून ज्युलियन काहीशी आनंदित होते. अतिशय अवघड वाट चालत चालत अखेर ती अशा ठिकाणी येऊन पोहोचते की तिच्या झऱ्याने आता छोट्या नदीचं रूप घेतलेलं असतं.साधारण तीसेक फूट रुंद पात्र तिच्या समोर असतं.वर पाहते तर जंगलही काहीसं विरळ झालेलं असतं आणि आकाशाचा एक तुकडा तिला स्वच्छ दिसू लागतो.आता इथून वस्ती फार दूर नसणार असं तिला वाटून जातं.थोड्याच वेळाने तिला विमानांची घरघरही ऐकू येऊ लागते.

ती पुन्हा एकदा जोरजोरात ओरडून विमानांचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करते.आता आपण विमानातून नक्की दिसू असं तिला वाटत असतं.विमानांचे आवाज कमी कमी होत लांब निघून जातात तेव्हाही ती स्वतःची समजूत काढते, की आता थोड्याच वेळात विमान पुन्हा परतेल आणि आपली सुटका होईल.पण बराच काळ जाऊनही काहीच घडत नाही.अंधार पडू लागतो तसं तिचं मन निराशेने भरून येतं.आपण सोडून विमानातल्या इतर सगळ्या प्रवाशांची सुटका झाली असणार आणि आपण सापडत नसल्यामुळे आता शोधमोहीम थांबवण्यात आली असणार असं वाटून तिचा संताप संताप होतो.रागाचा भर ओसरल्यावर ज्युलियन थोडी शांत होते.

आपल्याकडे एवढ्या भावनिक आंदोलनांसाठी अजूनही इतकी शक्ती शिल्लक आहे याचं तिला आश्चर्य वाटत राहतं.याचा अर्थ अजूनही आपण आशा सोडता कामा नये. चालत राहिलो तर लवकरच एखाद्या वस्तीपाशी पोहोचू, हा विचार पुन्हा एकदा तिचा ताबा घेतो आणि पुन्हा एकदा पुढे मार्गक्रमण कसं करायचं याचा विचार करण्यात ती स्वतःचं मन गुंतवते.एकच सँडल घातलेल्या पायांनी काठावरून चालवणं अवघड जात असल्यामुळे ती नदीच्या पात्रातूनच चालायचं ठरवते.शिवाय जंगलामध्ये नदीच्या काठावर स्टिंग रे विश्रांती घेत बसलेले असतात याचीही तिला माहिती असते.अशा एखाद्या स्टिंग रेवर चुकून जरी पाय पडला तरी मृत्यू ओढवणार हे नक्की.त्यापेक्षा नदीतून चाललेलं बरं, असा विचार ती करते.अर्थात नदीच्या पाण्यातही धोके कमी नसतात.मगरींची भीती असते.शिवाय पिरान्हा नावाचे शिकारी मासेही या पाण्यात आढळण्याची शक्यता असतेच.पण हे प्राणी कारणाशिवाय माणसावर हल्ला करणार नाहीत हे ज्युलियनला माहिती असतं. शिवाय,

काहीही असलं तरी हे धोके पत्करून चालत राहण्याशिवाय तिच्यापुढे पर्याय काय असतो?एखादी चांगली जागा सापडली तर तिथेच थांबून राहावं आणि सुटकेसाठी कोणी येईल याची वाट पाहावी का,असंही तिच्या मनात एक-दोनदा येऊन जातं.पण आता थांबलो आणि आणखी चार दिवसांनी पुन्हा चालण्याची वेळ आली तर तेवढी शक्ती आपल्याकडे उरणार नाही आणि आपण या जंगलातच संपून जाऊ याची जाणीव तिला पुढे रेटत असते.चालत राहिलो तर आपण एक ना एक दिवस मानवी वस्तीपर्यंत किंवा सुटकेसाठी शोधमोहीम राबवणाऱ्यांपर्यंत पोहोचू,असा विश्वास तिला मनातून वाटत असतो.एक चांगलं असतं,की मनातून तशी शंका असली तरी आता लवकरच शोधमोहीम थांबवली जाणार असल्याचं ज्युलियनला कळण्याची काही शक्यता नसते.तिला हेदेखील कळण्याची शक्यता नसते की विमानातील एकाही व्यक्तीची सुटका झालेली नसते.किंवा,तेव्हा तिला याचीही कल्पना आलेली नसते की विमान पडल्यानंतर सर्वच प्रवाशांना लगेच मृत्यू आलेला नसतो.काही प्रवासी काही काळ जिवंत असतात;पण तिथून बाहेर पडून स्वतःची सुटका करून घेण्याचं ज्युलियनसारखं भाग्य त्यांना लाभत नाही.त्या प्रवाशांमध्ये तिच्या आईचाही समावेश असतो.पुढे तिला जेव्हा हे समजतं तेव्हा आईचं त्या काळात काय झालं

असेल या विचाराने ती किती तरी रात्री तळमळत काढते.जंगलात असताना झाला नसेल एवढा त्रास तिला पुन्हा बाहेरच्या जगात येऊन या सत्याशी सामना करताना होतो.एका अर्थाने तिचा जगण्याचा झगडा सुरू होतो तो तिथून बाहेर पडल्यावरच.

पण सध्या आत जंगलात मात्र सर्व बातम्यांपासून दूर ती स्वतःच्या विचारांमध्ये चालत असते;पण पहिल्या तीन-चार दिवसांनंतर मात्र चालणं आणि रात्रीची झोप या दोन्ही गोष्टी अधिकाधिक त्रासदायक बनत जातात. रात्र तर अतिशय वेदनादायी असते.डास किंवा कोणते ना कोणते किडे रात्री तिच्या जवळपास उघड्या अंगावर चाल करून येत असतात.थोडी डुलकी लागते ना लागते तोच नवा दंश तिला जागं करत असतो.

चिलटं,माश्या, पिसवा आणि अशा हजारो प्रकारच्या किड्यांची संख्या इतकी असते की बास.ते किडे तिच्या तोंडात,नाकात, डोळ्यांत,कानांत सगळीकडे शिरून चावे घेत असतात. हे कमी की काय,म्हणून कधी तरी रात्रीतूनच पाऊस सुरू होतो.दिवसाच्या वेळी जंगलातली हवा दमट आणि उष्ण असली तरी रात्री पाऊस सुरू झाल्यावर मात्र कडाक्याची थंडी वाजते.पावसाचे थेंब सुया टोचल्यासारखे ज्युलियनच्या अंगात घुसत असतात. छोट्याशा ड्रेसमध्ये चिंब भिजून आता आणखी थंडी सहन होणं शक्य नाही अशा परिस्थितीत ज्युलियन रात्रच्या रात्र कुडकुडत काढते.

अशा वेळी बहुतेकदा ज्युलियन आपल्या आईचा विचार करत प्रार्थना करत राहते.हा अपघात कसा काय झाला, आपण उठलो तेव्हा एकट्याच कशा काय होतो,बाकीचे प्रवासी कुठे गेले,आई कुठे असेल,विमानाचे अवशेष कुठे पडले असतील,असे कोड्यात टाकणारे प्रश्न तिच्या मनाला व्यापून असतात.एवढ्या उंचीवरून पडल्यावरही आपण कसे काय वाचलो,हा प्रश्न तर अनेकदा तिच्या मनात उचंबळून येत असतो.

ज्याअर्थी आपण १० हजार फुटांवरून कोसळूनही वाचलो त्याअर्थी आता आपण या जंगलात मरून जाणं शक्य नाही. आपण जिवंत राहिलो त्यामागे काही तरी कारण असणार,

असं तिला सतत वाटू लागतं.चालता चालता,रात्र मुक्कामाच्या ठिकाणी थांबल्यावर ती खूप वेळ हा विचार करत राहते.आपण का जिवंत राहिलो?आपल्या आयुष्याचा हेतू काय? त्यातून आजवर कधीच न पडलेले प्रश्न तिला पडू लागतात.आपल्या आई-वडिलांप्रमाणे आपणही जीवशास्त्राचा अभ्यास करायचा हे आधीपासूनच ठरलेलं असतं,पण त्यामागच्या कारणांचा फारसा विचार मात्र तिने केलेला नसतो.पण आता स्वतःचा संवाद करायला वेळच वेळ असण्याच्या काळात हा विचार तिचं मन व्यापून टाकतो.ज्या जंगलातून ती बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असते त्याच जंगलाच्या अभ्यासासाठी,तिथल्या पक्ष्या-प्राण्यांच्या अभ्यासासाठी आपण आयुष्यभर काम करायला हवं…!

अपूर्ण शेवटचा तिसरा भाग पुढील लेखामध्ये…!!



5/5/26

तरुण मुलीची सत्यकथा / True story of a young girl

जिवावरच्या संकटातून स्वतःच्या हिमतीवर बाहेर पडण्याचा अनुभव माणसांना कायमचा बदलवून टाकतो.विमान कोसळल्यानंतर अ‍ॅमेझॉनच्या जंगलात दहा दिवस एकटीने पायपीट करणाऱ्या ज्युलियन कोपेक या तरुण मुलीची सत्यकथा अशा प्रसंगी मनात घडणाऱ्या उलथापालथर्थीची कहाणी सांगते.

२४ डिसेंबर १९७१.पेरूची राजधानी लिमाचा विमानतळ भरून वाहतो आहे.ख्रिसमसच्या आधीचा दिवस असल्यामुळे प्रत्येकालाच आपापल्या कुटुंबीयांजवळ पोहोचण्याची घाई आहे.सतरा वर्षांची ज्युलियन कोपेक आणि तिची आई मारिया या दोघी त्यात आहेत.ज्युलियनच्या आई-वडिलांचं पेरूच्या अमेझॉन जंगलात पुकाल्पा गावाजवळ संशोधन केंद्र आहे.तिचे वडील सध्या तिथेच आहेत.आदल्या दिवशी ज्युलियनच्या कॉलेजमध्ये कार्यक्रम असल्यामुळे त्यांना अगदी ऐन वेळचं फ्लाइट पकडायला लागतं आणि

 तेही अपघातांसाठी कुप्रसिद्ध असलेल्या लान्सा एअरलाइन्सचं.'दरवेळी अशा दुर्घटना घडत नसतात आणि आपल्यासारख्या सामान्य माणसांच्या आयुष्यात तर कधीच असं घडत नसतं', असं म्हणत या दोधी विमानात बसतात, लिमा ते पुकाल्पा हा अवध्या तासाभराचा प्रवास.हवा अगदी उत्तम असते,प्रवास सुरळीत सुरू असतो;पण दुपारी साडेबाराच्या सुमारास कोणतीही पूर्वकल्पना न देता एक वादळ अचानक विमानावर थडकतं.मोठा हादरा बसतो आणि काही कळायच्या आत ज्युलियनच्या लक्षात येतं की आपण विमानातून खाली कोसळतो आहोत..

… जाग येते तेव्हा ज्युलियन अ‍ॅमेझॉनच्या जंगलात चिखलमाती आणि पालापाचोळ्याने आच्छादलेल्या जमिनीवर पडलेली असते.एका क्षणात तिच्या लक्षात येतं की आपलं विमान क्रैश झालं आहे आणि आपण जंगलात कोसळलो आहोत आणि आपली आई आपल्याजवळ दिसत नाही.पण आई-वडिलांचं संशोधन केंद्र अ‍ॅमेझॉनमध्येच असल्याने या जंगलाचा स्वभाव तिच्या ओळखीचं असतो,हाच काय तो दिलासा.ती उठून उभी राहण्याचा प्रयत्न करते;पण त्यासरशी तिच्या डोळ्यांसमोर अंधारी येते. थोडा वेळ तशीच पडून राहिल्यावर ती हातावरचं घड्याळ चाचपून पाहते,तर बरेच तडे गेले असले तरी घड्याळ अजून सुरू असतं.नऊ वाजलेले असतात. प्रकाशावरून ज्युलियन ताडते की सकाळची वेळ असावी.म्हणजे आदल्या दिवशी दुपारी विमान कोसळल्यापासून सकाळपर्यंत ती बेशुद्धावस्थेत जंगलामध्ये पडून असते.बऱ्याच प्रयत्नांनंतर तिला उठून उभं राहायला जमतं. आपल्याला नेमकं कुठे आणि किती लागलंय हे ती चाचपून बघते.मानेजवळचं एक हाड वेडवाकडं लागत असल्याचं आणि पिंढरीला एक खोल जखम झाल्याचं तिला तपासणी केल्यावर जाणवतं;पण आश्चर्य म्हणजे दोन्ही ठिकाणी तिला दुखत नसतं.किमान १० हजार फुटांवरून कोसळूनही एवढ्या मामुली जखमांवर आपलं कसं काय निभावलं हे तिला कळत नाही.

ज्युलियन कोपेक,जंगलात येऊन पडलेल्या मुलीची गोष्ट,मृत्यू पाहिलेली माणसं,गौरी कानेटकर,समकालीन प्रकाशन,

आपण खरंच विमानातून खाली कोसळलो की हे केवळ स्वप्न आहे,असा प्रश्न तिला पडतो.या जखमांपेक्षा दोन-तीन गंभीर समस्या असतात.एक तर तिचा चष्मा हरवलेला असतो,एक सँडल गायब असते आणि तिचा उन्हाळ्यासाठी घातलेला आखूड ड्रेस जंगलातल्या मुक्कामासाठी अगदीच चुकीचा असतो.चांगले बूट आणि योग्य कपडे नसताना अमेझॉनच्या जंगलात राहणं म्हणजे खरं तर मृत्यूला आमंत्रण.कारण साप आणि नाना प्रकारच्या विषारी कीटकांचं ते साम्राज्यच. त्यामुळे कटकट वाटत असूनही ज्युलियन एक सँडल घालूनच चालत असते.किमान एका पायाचं तरी थोडं संरक्षण !

उठून चालता येऊ लागल्यावर ज्युलियनची पहिली प्रतिक्रिया असते ती आजूबाजूला विमानातलं अन्य कोणी दिसतं का ते पाहण्याची.अ‍ॅमेझॉनचं रेन फॉरेस्ट म्हणजे प्रचंड आकारांच्या झाडांची गर्दी असलेलं जंगल.दहा पावलंही सरळ चालता येऊ शकणार नाही इतकं दाट.त्यातून वाट काढत काढत ज्युलियन आसपासचा परिसर हिंडते,पण तिथे विमान कोसळल्याची कुठलीच चिन्हं नसतात.ना विमानाचे अवशेष,ना जखमी माणसं,ना विमानात तिच्या शेजारी बसलेली तिची आई.विमानातून फक्त आपणच खाली कोसळलो की काय असं ज्युलियनला वाटतं.अर्थात ही शोधाशोध करताना एखादी खूण लक्षात ठेवणं गरजेचं आहे याचं भानही तिला असतं.कारण अमेझॉनमध्ये व्यवस्थित आखलेल्या खुणा नसतील तर माणसाला चकवा लागायला वेळ लागत नाही हे ज्युलियनला चांगलं ठाऊक असतं थोड्याच वेळात तिला कळून चुकतं की आपल्या आसपास मदतीला इतर कोणीही नाही. 

विमान नेमकं कुठे पडलंय ते आपल्याला माहिती नाही. थोडक्यात,या किर्र जंगलात आपण आता एकटेच असून कोणीही तातडीने आपल्या मदतीला येण्याची शक्यता नाही.पण तरीही ज्युलियन घाबरून जात नाही की आपण कुठे जंगलात येऊन पडलो अशी भावना तिच्या मनात तयार होत नाही.याचं एक कारण बहुधा विमानातून खाली कोसळल्याच्या धक्क्यामुळे ती काहीशी बधिर झालेली असते.कोणतीच भावना पटकन तिचा ताबा घेत नाही.ना तिला भीती वाटत असते,ना जखमांमुळे वेदना होत असतात ना आता आपलं कसं होणार याची चिंता वाटत असते.

दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे अमेझॉनचं हे जंगल तिच्या ओळखीचं असतं.लहानपणापासून ती आई-वडिलांच्या संशोधन केंद्रात येत-जात असते आणि दोन-तीन वर्षं तर ती या जंगलात राहिलेली असते,आई-वडिलांबरोबर जंगलात भरपूर भटकलेली असते.जंगलाचे कायदेकानून तिला माहिती असतात. झाडा-वनस्पतींशी,प्राण्यांशी,असंख्य विषारी किड्यांशी,सापांशी आणि एकूणच प्रत्येक वेळेला रूप बदलणाऱ्या जंगलाशी तिची ओळखच नव्हे तर मैत्री असते.

आता आपल्यालाच जंगलातून बाहेर पडण्याचा रस्ता शोधावा लागणार हे लक्षात आल्यावर तिला वडिलांनी सांगितलेला जंगलातला पहिला नियम आठवतो कधीही जंगलात हरवलीस तर वाहतं पाणी शोधून काढ.पाणी ज्या दिशेला वाहतंय त्या दिशेने पाण्यासोबत चालत राहिलीस तर माणसांच्या वस्तीपर्यंत पोहोचशील.त्यामुळे तिच्याही नकळत ती पाण्याचा शोध घेऊ लागते.थोडा वेळ आसपास फिरल्यावर ज्यूलियनला एक ओळखीचा आवाज ऐकू येऊ लागतो.अगदी छोटा ओहोळ वाहत असल्याचा आवाज.त्या दिशेने गेल्यावर थोड्याच वेळात ती पाण्यापाशी जाऊन पोहोचते.वाटेत तिला कँडीचं एक पाकीट सापडत,पण ते सोडता इतर प्रवाशांच्या काहीच खाणाखुणा तिला दिसत नाहीत.तिच्या स्वतःच्या तुलनेने छोट्या जखमा पाहता विमानातले प्रवासी बचावले नसतील अशी शंकाही तिला येत नाही.आपल्यापासून लांब कुठे तरी तेही जिवंत असतील आणि त्यात आपली आईही असेल असंच तिला वाटत असतं. त्यामुळे त्यांची वाट पाहत थांबून न राहता या छोट्या ओहोळाचा माग पकडून चालत राहायचं असं ती ठरवते.पण या ओहोळाच्या सोबतीने चालणं सोपं नसतं.झाडांच्या गर्दीमध्ये पाय ठेवायलाही जागा नसते. शिवाय सगळा परिसर चढ-उताराचा असतो.कधी कधी ज्युलियनला झाडांमधून वाट काढत बरंच चढून जावं लागतं;पण हे चढ टाळण्यासाठी शॉर्टकट घेऊन जंगलाच्या आत शिरणं किती जोखमीचं आहे याची तिला कल्पना असते.

त्यामुळे कितीही दमणूक होत असली तरी ती पाण्याच्या काठाने चालत राहते.थोड्या वेळाने हा ओहोळ मोठा होत जातो आणि त्याचं छोट्या झऱ्यात रूपांतर होतं.आता त्याच्या कडेने चालणंही थोडं कमी त्रासदायक बनतं.अपघातानंतरच्या दुसऱ्या दिवशी संध्याकाळी पाचच्या सुमारास अंधार पडायला लागतो आणि ज्युलियन रात्री मुक्कामासाठी थोडी बरी जागा शोधून झोपण्याची तयारी करते.

फुट कँडीचं एक पाकीट वगळता ज्युलियनकडे खायला काहीच नसतं.मासे पकडून भाजून खावेत,असा विचार केलाच तरी आग पेटवायलाही तिच्याकडे काही साधनं नसतात.अगदी दोन वाळक्या काटक्यांनी किंवा दगडांनी ठिणगी कशी पेटवायची हेही तिला माहिती असतं;पण या पावसाळ्यात सगळं जंगल भिजलेलं असताना तेही शक्य नसतं.एक कँडी खाऊन झऱ्यातलं पाणी भरपूर पिणं एवढंच तिच्या हातात असतं.

★★★ अपुर्ण उर्वरित भाग पुढील लेखामध्ये…

5/3/26

एका दिवसाची देणगी / A day's donation

जीवनाचा मथित अर्थ काढायचा तर एका वेळी एकच दिवस हाती येतो.तो दिवस म्हणजे आजचा दिवस.

जेसन स्टीव्हन्सच्या सर्वोत्तम देणगीच्या शोधप्रवासाच्या या अकराव्या महिन्यात आम्ही प्रवेश करत होतो,आणि मला भान आलं की,या महिन्यात रेड स्टीव्हन्सची प्रथम पुण्यतिथी येणार आहे.माझा आयुष्यभराचा मित्र आणि सखा,त्याचा विचार मी वारंवार करीत असे. रेड स्टीव्हन्स आणि मी अगदी पूर्णतःभिन्न पार्श्वभूमितून आलेलो होतो,आणि वरवर पाहिलं तर,आमच्यात तसं काही साम्य नव्हतं.पण कुठेतरी आम्हा दोघांत आलेला समान धागा आम्हाला सापडला,आणि यामुळे पाच दशकांहून जास्त टिकलेली आमची मैत्री विकसित झाली अन जोपासली गेली.

सर्वोत्तम देणगी,जिम स्टोव्हॅल,स्वाधारित कलासामग्री,

डॉन बिलिंग्ज,अनुवाद - दिशा केळकर

EMBASSY BOOK DISTRIBUTORS

रेड स्टीव्हन्स याची,अचाट असलेला माणूस म्हणून मला नेहमी आठवण राहील.बॅकबे बोस्टनमधल्या माझ्या कार्यालयात निवांत असलेला मी,तर रेड स्टीव्हन्स टेक्ससमध्ये मजेत असलेला.कसं कोण जाणे हे सगळं त्याला अगदी मान्य असायचं.रेड सारखी माणंस घडायची तर टेक्सससारखंच ठिकाण हवं.

पूर्वी कोणीतरी म्हणून गेल्याचं माझ्या ऐकण्यात होतं की कुणाला एकच जरी मित्र असला,तरी तो माणूस एकटा पडत नाही.रेड स्टीव्हन्ससारखा मित्र कोणाला लाभला तर तो कधीच एकटा पडणार नाही,एवढं मात्र मी खात्रीने म्हणतो.तो कायम माझ्यासोबत असणार हे मला ठाऊक होतं.सर्वोत्तम देणगी मिळण्याकडे एकेक पायरी ओलांडायची,याकरिता जेसनला साथ करायची जबाबदारी त्यानं माझ्यावर टाकली होती,याचा मला अभिमान वाटला.

जेसन स्टीव्हन्स आला तेव्हा माझ्या मनात असे विचार होते.

आमच्या कायदेविषयक फर्मच्या कॉन्फरन्स रूममध्ये आमच्या सवयीच्या जागी आम्ही जाऊन बसलो,बरोबर ठरल्यासारखा पुन्हा एकदा रेड स्टीव्हन्स व्हिडिओ टेप आणि तो खोलीच्या टोकाला असलेला मोठा पडदा यांच्यामार्फत आमच्यासामोर आला.तो हसला आणि मोठ्यानं म्हणाला,

"अभिनंदन,जेसन. मी आज तुझ्याशी बोलतोय याचा अर्थ मिस्टर हॅमिल्टनने मागच्या महिन्यात तू सर्वोत्तम देणगी ज्या प्रकारे हाताळलीस,तिला संमती दिली आहे.

'जेसन,तुला हे माहीत हवं की मी आपल्या मृत्यूपत्राद्वारे तुला सर्वोत्तम देणगी देण्याच्या विचारात असतांना मी तुझ्याबद्दल विचार करण्यात खूप काळ खर्च केला.रोज सकाळी करण्याच्या माझ्या सोनेरी यादीत तुला कायम स्थान मिळाले आहे.तू अणि मी यांच्यात रक्ताच्या नात्यापलीकडे जाणारा,एकच कौटुंबिक वारसा आहे. याची मला धन्यता वाटते."

रेड असं बोलत होता,तेव्हा जेसन मान डोलवत असलेला मी डोळ्याच्या कोपऱ्यातून पाहिलं.

रेड पुढं बोलत होता,"माझं मृत्युपत्र करण्याच्या कामातून मी जात होतो,आणि माझं जगणं आणि माझा मृत्यु यांचा विचार करीत होतो तेव्हा,मी माझ्या जगण्यातल्या सर्व मूलतत्त्वांना विचारात घेतलं,त्यांनी ते एक खास रसायन बनवलं होतं.मी खूप आठवणींना उजाळा दिलाय आणि त्या सर्व आठवणी मी एखाद्या खजिन्याप्रमाणे संभाळतो.

"जेव्हा आपल्याला मृत्युच्या छायेचं भान येतं,तेव्हा आपण आयुष्याचा हिशोब मांडतो,किती जगून झालं, आणि किती जगायचं राहिलं,वाळूच्या घड्याळात वाळू सरकत असते,तसं असंत ते.आयुष्याच्या एका टप्प्यावर आपल्याला वाटत रहातं,हा आयुष्याचा एकच दिवस राहिलाय.तेव्हा,किंवा मरायच्या दिवशी आपण कसे जगायचे याचा मी विचार करत असे.मला असं लक्षात आलं की,तो दिवस पुढे पुढे ढकलण्याचं चित्र मनात नीट ठसलं तर जीवनाचा गाभा माझ्या हाती लागला आहे,कारण आयुष्य म्हणजे दिवसांमागून जाणारे दिवस याहून दुसरं काय असतं ? एक दिवस,त्याचा पूर्ण उपयोग करून घ्यायला आपण शिकलो तर आपलं जीवन खूप अर्थपूर्ण होईल आणि समृद्ध होईल.

"जेसन,पुढच्या तीस दिवसांत,तू तुझ्या आयुष्याचा शेवटचा दिवस कसा घालवशील याची योजना तू करायची आहेस.महिन्याच्या शेवटी,माझी मागणी अशी आहे की तू त्याचा सविस्तर अहवाल मिस्टर हॅमिल्टनला सांगायचा.एका दिवसाच्या वेळात जीवनाचा केवढा भाग सामावता येतो,याचा तुला शोध लागेल आणि मग ज्याचा शोध मला लागला,त्याचाच शोध तुलाही लागेल. जास्तीत जास्त जगणे भोगण्यासाठी आपण शेवटच्या दिवसाची का बरं वाट बघायची ? या शेवटच्या दिवसाचा कार्यक्रम आखण्यासाठी लागेल अशी सगळी साधनसामग्री तुझ्याजवळ आहे,मी तुला आजच्या आणि उरलेल्या आयुष्याच्या प्रत्येक दिवसासाठी शुभेच्छा देतो."

पडद्यावरून रेड स्टीव्हन्स दिसेनासा झाला.

जेसननं दीर्घ श्वास सोडला,आणि म्हणाला, "माहिती आहे,आयुष्याचा शेवटचा दिवस किंवा मृत्यू याबद्दल मी खरंच अजिबात विचार केला नाहीये."

मी हसून उत्तर दिलं,"मी तुझ्या वयाचा असताना मी ही याचा फार विचार केला नव्हता.

पण मला वाटतं,तुझे आजोबा तुला जे शिकवण्याचा प्रयत्न करताहेत ते असं की,पद्धतशीर विचार केला तर खूप काही मिळण्यासारखं आहे,आणि मला तर खरंच वाटतं की याचा विचार आपण तरूण वयात केला तर तुमच्या आयुष्याची गुणवत्ता वाढेल." जेसन आणि मी उठून हस्तांदोलन केलं,आणि महिनाभरात दिवस ही एक देणगी कशी असते याचा शोध घ्यायला,त्या विचारसृष्टीत जायला,जेसन निघून गेला.जेसनहून माझं निराळं होतं.मी आपल्या आयुष्याचा शेवटचा दिवस कसा घालवणार याचा काही विचार मी केला होता.त्या शेवटच्या चोवीस तासांत मला काय उरकायला आवडेल असं मनांत येत होतं. महिनाभर माझ्या मनांत हेच विचार येत राहिले.

महिन्याच्या अखेरीस,जेसन स्टीव्हन्स माझ्या कार्यालयात आला.एका मोहिमेवर निघालेल्या माणसाची त्याची चालचलणूक होती.तो माझ्या अशिलांसाठी असलेल्यापैकी एका खुर्चीत बसला, आणि मिस् हेस्टिंग्ज दुसरीत बसली.

मी म्हटलं,"तुला पुन्हा भेटायला छानच वाटतंय,जेसन हा महिना तुझ्यासाठी सफल झाला असावा."

जेसन उत्साहानं उद्‌गारला,"अगदी मौज वाटली.मी मरण्यापूर्वी जे जे करावसं वाटणार,ते ते सर्व काही एका दिवसात मावण्याइतका दिवस पुरेल,याची मला खात्री नाहीये.अगदी विस्मयकारक गोष्ट म्हणजे माझ्या आयुष्याच्या शेवटच्या दिवशी कराव्याशा वाटतात अशा गोष्टी अगदी सामान्य आणि साध्यासुध्या आहेत.

"सुरुवातीला मी या गोष्टीचा विचार करायला लागलो, तेव्हा वाटलं,एका उंच पर्वतावर जाऊन यावं किंवा एखादी भव्य कलाकृती निर्माण करावी,किंवा असंच काहीतरी.पण नीट विचार केल्यावर,असं लक्षात आलं की सुंदर,छोट्याछोट्या गोष्टींनी माझ्या आयुष्याचा शेवटचा दिवस खरोखर मला भरून पावेल."

जेसन थांबला,आणि मिस् हेस्टिंग्ज आणि मी दोघांकडे त्यानं पाहिलं.त्यानं कोटाच्या खिशात हात घातला आणि एक लहानसा कागद बाहेर काढला.त्या टिप्पणाकडे एक नजर टाकून पुन्हा तो बोलायला लागला.

"माझ्या आयुष्याच्या शेवटच्या दिवशी मी सकाळी लवकर उठणं पसंत करीन.वाया घालवायला वेळ नसेल.अंथरूण सोडण्याच्याही आधी मला ज्या ज्या गोष्टींबद्दल कृतज्ञता वाटते,त्या गोष्टींची उजळणी करीन, आणि माझ्या मनाची सोनेरी यादी तयार करीन.पण मागच्या महिन्यात जशी तयार केली तशी ती दहा गोष्टींपर्यंत मर्यादित नसेल,मला वाटतं आयुष्याच्या त्या शेवटच्या दिवशी मी ज्यासाठी धन्य असावं अशा बऱ्याच गोष्टींची भर घालावी लागेल.

"घराच्या मागच्या उघड्या ओट्यावर कांही खास मित्रांच्या समवेत जरा लवकरच नाश्ता करायला आवडेल,मला माझ्या आयुष्यात त्यास किती मोठ स्थान आहे हे मी त्यांना सांगेन त्यांच्यातल्या प्रत्येकाला मी अशी भेट देईन की ती मिळाल्यामुळे त्यांचे सर्व आयुष्य सार्थकी लागेल.'नाश्ता झाल्यावर मी काही खास लोकांशी फोनवर बोलणार.

टेक्सासमधला गस कोल्डवेल,दक्षिण अमेरिकेतली रेड स्टीव्हन्स वाचनालयात येणारी माणस, मेनमध्ये राहणारी ती वसतीगृहातली मुलं आणि अशी बरीचजण आहेत.असे कांही नातेवाईक आहेत की मी ज्यांच्याशी फारसे चांगले संबंध ठेवले नाते आणि इतर असेच लोक आहेत,त्यांना मी फोनवर भेटणार. त्यातल्या प्रत्येकाला मी सांगेन की आपल्यामध्ये जे चुकलंमाकलं त्याबद्दल मी दिल्लगीर आहे.मी जे करतोय ते त्यांनीही करावं अम मी त्यांना सागेन ते असे की चांगल्या आठवणी तेवढ्या ठेवून वाईट आठवणींची छुट्टी करायची.

"दुपारच्या जेवणासाठी मी ब्रायनला कुठेतरी बाहेर घेऊन जाईन,आणि त्याला हवं ते खायला घालीन, त्याची त्याच्या जीवनाबद्दल जी स्वप्न असतील त्यात मी वाटेकरी होईन.

"सरत्या दुपारी मी साध्या साध्या गोष्टींचा आनंद लुटणार.त्यात बागेत फिरायला जाणं असेल.या वर्षाच्या सुरुवातीला रूग्णालयातून आलेली ती एमिली,ती असावी माझ्यासोबत.नंतर बोस्टनच्या धक्क्यावर जाऊन एखादी बोटीतनं छोटीशी चक्कर मारीन,आणि कलादालनाला भेट देऊन येईन.

"मग संध्याकाळी मी एक खास पार्टी देणार.त्यात माझे सगळे मित्र,त्यांचे मित्र आणि खास म्हणजे तुम्ही दोघे असाल,पार्टीच्या शेवटी मी तिथल्या स्टेजवर सर्वांसमोर उभा राहून माझे आजोबा रेड स्टीव्हन्स यांनी मला जी सर्वोत्तम देणगी दिली.त्याबद्दल सांगेन,मी त्याचं व्हिडिओ टेप रेकॉर्डिंग करून घेणार म्हणजे मला जे हवंय,की मी मेल्यानंतरही अशा मस्त देणगीचा लाभ माझ्यासारख्या इतरही सर्व तरुणांना होईल."

जेसननं मिस् हेस्टिंग्जकडं आणि माझ्याकडं ओझरतं पाहीलं आणि परत त्याच्या कागदाकडे पाहिलं.काही क्षणांनी त्यानं कागदाची घडी घातली आणि तो परत खिशात ठेवून दिला.तो म्हणाला,"खरं तर खूप गोष्टी आणखी करायच्या होत्या,आणि त्या सगळ्या चांगल्याही होत्या.पण मी ज्या लिहिल्यायत त्या मला वाटलं,माझ्या शेवटच्या दिवसात बरोबर बसवता येतील."

मी हसून म्हटलं,"जेसन,शेवटचा दिवस घालवण्याचा याहून दुसरा चांगला मार्ग मला तरी ठाऊक नाही.मला वाटतं,तुझ्या रेड आजोबांच्या मनांतलं दिवस म्हणजे एक देणगी कशी असते हे तुला नीट समजलंय,यावर आपलं सर्वांचं एकमत असणार."

जेसन उठला,आणि माझ्याशी मनापासून हस्तांदोलन करून मिस् हेस्टिंग्जला उराउरी भेटला.मिस् हेस्टिंग्ज त्याला पोचवायला लिफ्टपर्यंत गेली,तेव्हा एका वर्षापूर्वी माझ्या कार्यालयात आलेला तो रागीट दुर्मुखलेल्या चेहऱ्याचा तरूण मला आठवला.मला माहीत आहे,रेड स्टीव्हन्स हसतोय आमच्या कडे बघून.

अपूर्ण शिल्लक भाग पुढील लेखामध्ये….

5/1/26

दैवी प्रकोप / Divine wrath !

ऑगस्टच्या शेवटी एका निरभ्र दुपारी महासमाज एका महत्त्वाच्या वार्षिक समारंभाची तयारी करत होता.सगळं वर्ष संभोग उड्डाणाकडे जात असतं. वारुळानं नवे जन्म देण्याची घटना असते ती. वारुळाचं सातत्य संभोग-उड्डाणानं राखलं जातं. मुंगी-प्रजातीचं अमरत्व त्या उड्डाणानं टिकवलं जातं. वेळकाळ योग्य होता.दोन दिवस आधी एका ढगांच्या समूहानं नोकोबी परिसरावर पाच सेंटिमीटर पाऊस ओतून जमिनीला ओलावा दिला होता. उन्हाळ्यानं कोमेजलेली झाडं नव्यानं तरारून उठत होती.सूर्य आणि नुकताच झालेला पाऊस यामुळे हवा शांत,दमट झाली होती.

मुंग्यांच्या मेंदूंमधल्या पंचांगानं संभोग उड्डाणाचा मुहूर्त जवळ आल्याची सूचना दिली.हजारो कामकरी मुंग्या जमिनीखालून पृष्ठभागावर येऊन धावाधाव करत होत्या.लवकरच शेकडो राजकुमारी आणि नरही जमिनीखालून वर आले.कोणीच उड्डाण करत नव्हतं.कोणीच वर भरारी मारत नव्हतं. महासमाजात उड्डाणाचा भाग बाद होऊन संभोगाचाच भाग उरला होता.अनेक नर एकमेकांना ढकलत,दूर सारत राजकुमारींशी जुगायला झटत होते.एखाद्या नरानं राजकुमारीशी संभोग करून शुक्राणू तिच्यात ओतले,तरी आसपासची धक्काबुक्की कमी होत नव्हती. संभोग न जमलेले नर धावपळ करून न फळलेल्या राजकुमारींच्या शोधात होते.त्यांचं आयुष्य लहानखुरं होतं.आणि राजकुमारीला गाठता न आलेल्या नरांचा निर्वंश होणार होता. कडोनिकडीची लढाई होती ही.


संभोग-स्पर्धेत जिंकलेले आणि हरलेले,सगळेच नर जरासे उडून मेले.नोकोबी परिसरातल्या सर्व दिव्यांखाली रात्री मेलेल्या मुंग्यांचा खच पडला.किडे,सरडे,विंचू,कोळी,

बेडूक,सगळे या मेजवानीवर ताव मारत होते. माणसांना मात्र जिवंत आणि मेलेल्या मुंग्यांचा त्रासच होता.सगळी अंगणं,बागा, रस्ते झाडावे लागले !

नरांच्या धडपडीच्या विरुद्ध स्थिती राजकुमारींची होती.एक संभोग,कधी एकापेक्षा जास्त संभोग, की पुन्हा जमिनीत जायची तयारी.पंख मोडायचे आणि आत एखादं दालन शोधून महासमाजासाठी अंडी द्यायला लागायचं.आज मात्र हे झालं नाही.हलत्या झाडांनीही आज मुंग्यांवर 'दैवी प्रकोप' पाठवायचं ठरवलं होतं. अनेक हलणारे झाड-देव घुबड तलावाकाठी आले. त्यांच्या सावल्यांनी,त्यांच्या वासांनी सगळा महासमाज परिसर व्यापला.त्यांच्या फांद्यामध्ये मोठाल्या वस्तू होत्या.त्या वजनांमुळे झाडं चालताना जमीन हादरत होती.आणि वातावरण एक विचित्र आवाजानं भारलं, तो आवाज ढगांच्या गडगडाटासारखा नव्हता,उंच झाडांमधून वाहणाऱ्या वाऱ्यासारखा आवाज होता तो.

तासाभरानं जमिनीवरच्या मुंग्यांना जाणवलं की झाड-देव परत येताहेत.पण या वेळी काहीच दिसत नव्हतं.फक्त एक विचित्र दुर्गंध हवेत होता.मुंग्या एकमेकींना धोक्यापासून सावध राहायला जसे फेरोमोन संदेश देतात,तसला हा वास. जमिनीवरच्या मुंग्या बावरून सैरावैरा पळायला लागल्या.शत्रू शोधत होत्या त्या. पण शत्रूचा पत्ता नव्हता.आणि मग मिनीटभरात सगळ्या क्षेत्रांवर एक रासायनिक ढग पसरला.

काही मुंग्यांनी हा तपासायला शिंगं उभारली,आणि त्या तत्काळ कोलमडल्या.त्या वात झाल्यासारख्या लोळागोळा होऊन पडल्या आणि मरण पावल्या.

रासायनिक ढग खाली जमिनीवर येऊन स्थिरावला,आणि जमिनीवर एकही मुंगी जिवंत उरली नाही.ढगामागून झाड-देव आले,आणि त्यांच्या फांद्यांमधल्या वस्तूंमधून काहीतरी द्रव पदार्थ जमिनीवर फवारला गेला.वारूळ-जंजाळाच्या प्रत्येक दारातून झाड-देवांनी ते द्रव्य सोडलं.

दुसऱ्या सकाळी महासमाज,महानगर,साम्राज्य सगळं संपलं होतं.ते झालं होतं मुंग्यांचं मृत्यु-क्षेत्र. सगळा परिसर निर्जीव झाला होता.मुंग्याच नव्हेत, तर सर्वच लहान जीव झाड-देवांनी मारून टाकले होते.पक्षी,

सरडे,खारी,काहीही जिवंत नव्हतं. महासमाज क्षेत्राबाहेर हे सगळे जीव शाबूत होते, आणि मुंग्याही.पण ते कोणीही या जहरी क्षेत्राजवळही येत नव्हते.झाड-देवांनी न तुडवलेली झुडपं आणि झाडोरा शिल्लक होता.कीटकसृष्टीचा मात्र आता मागमूसही उरला नव्हता.वाऱ्यानं होणारी झाडांची सळसळ,तलावाकाठचा लाटांचा नाद,हे सोडून नीरव शांतता पसरली होती.

नवा गडी...

दोन लहानशा झाडांच्या मुळांमध्ये जमिनीत एक खड्डा होता.त्यात एक लहानसं,झुडपांमध्ये घडवलेलं वारूळ होतं;झुडूप-वारूळ म्हणू या त्याला महासमाजाच्या मृत्युक्षेत्राच्या जरा कडेला हे वारूळ होतं.

आधी जेव्हा पायवाट वारूळ आणि नंतर ओढा वारूळ या भागावर सत्ता गाजवत असत, तेव्हा त्यांच्या गस्ती मुंग्या कधीकधी झुडूप-वारुळाच्या दाराजवळूनही जात असत.पण त्यांना हे लहानखुरं वारूळ जाणवत नसे.झुडूप वारुळातल्या मुंग्या आपल्या वारुळाजवळच वावरत.अन्न कमी असल्यानं वारुळाची वाढ मंद होती.थोडेसे मेलेले कीटक,इतरांना न सापडलेले, यांच्यावरच जेमतेम गुजराण होत असे.महासमाज घडल्यावर तर स्थिती आणिकच बिघडली.त्यांच्या मुंग्यांची गस्त जास्त आक्रमक असायची.त्या मुंग्या झुडूप-क्षेत्रात जास्त घुसखोरीही करायच्या,आणि सहजच मारामारीला तयार व्हायच्या.. झुडूप- वारुळाचं क्षेत्र यामुळे आणिकच आक्रसलं.महासमाज माणसांच्या विषप्रयोगानं मेला,त्याच वेळी झुडूप-वारूळही खचत आलं होतं.पायवाट वारुळाच्या काळात झुडूप-वारुळात शंभरेक मुंग्याच होत्या.महासमाज काळात तर जेमतेम वीस मुंग्या उरल्या,आणि त्याही बाहेर पडायला घाबरणाऱ्या. या वीस मुंग्यांमध्ये एकही सैनिक नव्हती.राणीची अंडाशयं सुकून चालली होती.अन्न कमी मिळाल्यानं अंडी देणं थांबलं होतं.कामकरी मुंग्या मरण्याचा वेग मात्र वाढला होता.उन्हाळा संपेपर्यंत झुडूप-वारूळ मरणार,आणि महासमाजाच्या जंजाळाचा भाग बनणार,असं चित्र दिसत होतं.पण हलते झाड-देव आले,आणि त्यांनी महासमाजाला ठार मारलं.त्या चमत्कारानं झुडूप वारुळावरचा जीवघेणा दबाव एकाएकी संपून गेला.

काही महासमाजी गस्ती मुंग्या जवळपास होत्या, पण घराकडे परतायचा प्रयत्न करताच त्याही विषारी जमिनीवर मरून पडल्या.आठवड्याभरात त्यांच्या वास्तव्याच्या फेरोमोन-खुणाही संपून गेल्या.आता घाबरत,बिचकत झुडूप-मुंग्या बाहेर पडू लागल्या.पूर्वी प्रबळ शेजारी असल्यानं अन्न मिळवणं अवघड जायचं.आता मात्र स्पर्धा संपल्यानं अन्न वाढलं.मेलेले कीटक,सहज पकडता येणारे कीटक,मावा किड्यांची विष्ठा,सगळंच आता जास्त प्रमाणात मिळू लागलं.पंधरा-तीन वारांमध्ये राणीची अंडाशयं पुन्हा जोमदार झाली.अंडी,निरोगी अळ्या वगैरेंनी संगोपन दालनं गजबजली.स्थिरावलेली लोकसंख्या नव्यानं वाढायला लागली.हिवाळा संपून वसंत ऋतू आला,तोपर्यंत झुडूप-वारूळ जोमदार झालं.कामकरी मुंग्या दूरवर फिरून नवनवे अन्नाचे स्रोत शोधून काढू लागल्या. आता महासमाजाच्या मृत्युक्षेत्रातलं विषही उडून, धुऊन गेलं होतं,आणि त्या भल्याथोरल्या क्षेत्रात कीटक आणि अळ्या सुरवंट पुन्हा वावरायला लागले होते.त्यांच्यावर जगणं झुडूप-मुंग्यांना सोपं जात होतं.नुकतंच वैराण असलेलं क्षेत्र आता नव्यानं पेरलेल्या,वाढलेल्या बागेसारखं झालं होतं. महासमाजाच्या वारूळ-जंजाळानं जमीन भुसभुशीत झाली होती.

महासमाजी मुंग्यांची प्रेतं कुजून जमिनीला खत मिळालं होतं.हे खत आणि आतवर खेळणाऱ्या हवेनं वनस्पतींची वाढ जोमदार झाली होती.गवत,झुडपं यांच्या बिया शेजारच्या जंगलातून येऊन पडल्या,की झपाट्यानं मुळं धरून त्यांची वाढ होत होती.जुन्या मृत्युक्षेत्रावर आता वनस्पतींचा हिरवाकंच गालिचा पसरला होता.

वसंत ऋतूत या वनस्पतींची फुलं फुलली,आणि त्या सुगंधानं परागीकरण करणारे जीव मृत्युक्षेत्रात परतले.भुंगे,पाकोळ्या,फुलपाखरं यांनी सगळं क्षेत्र जिवंत झालं.आणि मुंग्यांचं अन्नही भरपूर आणि विविध प्रकारचं झालं.नुकतीच या भागावर महामारी येऊन गेली,याच्या खुणाही पूर्णपणे पुसल्या गेल्या.

वारुळ पुराण,सातेरीचा वाडा झाला चिरेबंदी,माधव गाडगीळ,उदंड वारुळे जाहली ! ई.ओ.विल्सन संक्षिप्त अनुवाद - नंदा खरे, मनोविकास प्रकाशन…

नव्यानं बहरणाऱ्या जीवसृष्टीत एक भाग होता कोळी-प्रकाराचा.खरं तर मृत्युक्षेत्रात पहिल्यांदा आले,ते कोळी.काही शेजारच्या जंगलांमधून चालतफिरत आले.पण एक मोठा गट हवाई मार्गानं आला ! कोळ्यांना पंख नसतात.पण लहान कोळ्यांना दूर जायचं असेल,तर त्यांच्याकडे एक युक्ती असते.एखादं गवताचं पातं किंवा झुडपाची काडी पाहून उंचावर जायचं.मग बूड उचलून आपल्या रेशीम देणाऱ्या ग्रंथींमधून रेशमाचा एक तंतू हवेत उडवायचा.हा नाजुकसा तंतू एखाद्या पतंगासारखा वाऱ्यानं ओढला जातो,आणि सोबत आपला कोळीही उडी मारून हवाई-प्रवासाला लागतो.वारा योग्य दिशेचा आणि वेगाचा असला, तर कोळी तीनेकशे मीटर उंच आणि कैक किलोमीटर दूर पोचू शकतो.

उतरायची इच्छा झाली, की आपला तंतू आत ओढून खाऊन टाकायचा. कणाकणानं तंतू खात संथपणे जमिनीवर लैंडिंग करता येतं.नव्या जागी फारसे कोळी नसले,तर छान अन्न कमावत जगता येतं.

फास टाकून भक्ष्य पकडणारे कोळी असतात.मोठी चक्राकार जाळी,गुंतागुंतीची जाळी.चाडीसारखी जाळी,अशा अनेक प्रकारच्या जाळ्यांनी भक्ष्य पकडता येतं.काही कोळी तर जाळंही न विणता अचल स्वस्थ बसून राहतात,आणि भक्ष्य जवळ आलं,की झडप घालून पकडतात.

तर नव्यानं वनस्पती-श्रीमंत झालेल्या महासमाज क्षेत्रात अशी विविध प्रकारची कीटकसृष्टी बहरली आणि सोबत झुडूप-वारूळही बहरलं.

अजूनही हा वाचन प्रवास सुरु राहिल.शिल्लक भाग पुढील लेखामध्ये…¶¶¶

4/29/26

चिंचा आल्यात पाडाला !The chickpeas are ripe!

दीर्घायुष्य असलेलं,चिवट सदा हिरवंगार असलेलं, डेरेदार आकाराचं,गर्द छाया देणारं,गावाचं वाऱ्या-वादळापासून संरक्षण करणारं विपुल पानं,फुलं, फळं देणारं,इतकेच नव्हे तर,बगळे,ढोकरी,पाणकावळे, कांबऱ्या ढोक-व्हाईट नेक्ड स्टॉर्क,कंकर व्हाईट आयबिस,अडई,वंडकी इत्यादीपक्ष्यांच्या गूढ घरट्यांना आश्रय देणारं कुठलं झाड असेल तर ते चिंचेचं होय.भारतात नारळाला कल्पवृक्ष तर चिंचेला खजुराचे झाड म्हणतात.

अरबी भाषेत चिंचेला तमार-उल-हिंद म्हणजे 'हिंदुस्तानचे खजुरीचे झाड' म्हणून संबोधले जाते. चिंचेच्या फळांचा रंग देखील खजुराच्या वर्णासारखाच. इंग्रजीत टॅमरिंड ह्या शब्दाचे मूळ जरी अरबी भाषेत असले तरी चिंचेचा उल्लेख अमरकोशासारख्या अतिप्राचीन संस्कृत ग्रंथात आला आहे।तिन्तिडी,चिञ्चाऽम्लिका म्हणजे चिंचेची तीन नावे आहेत.तिन्तिडी,चिंचा व अम्लिका.

भंडारा जिल्ह्यात पस्तीत हजारांवर तळी आहेत.ह्या तलावांच्या प्रदेशात नऊ लाखांवर चिंचेची झाडं आहेत, हे क्वचित कुणाला ठाऊक असेल.जिथं पिकतं तिथं विकत नाही म्हणतात.कुठंही एखाद्या उंच डोंगरावर जाऊन उभे रहा.तुम्हाला दूरवर दिसतील ती चिंचेच्या राईत वसलेली लहान-मोठी गावं.त्यातून डोकावत असलेली मंदिरांची शिखरं.काही ठिकाणी विशाल चिंचेच्या मोठ्या राया आहेत.अगोदर राई वाढली की गाव वसलं,हे सांगणंही कठीण जातं.वाटतं,विविध हिरव्या वर्णांची झाक असलेले जणू ढगच गावाला व्यापून राहिले आहेत.

वृक्षाला कोवळी पालवी फुटू लागली की वाटतं,वैडूर्य मण्यांचे घुमट गावात उभे आहेत.नंतर त्यांचा वर्ण हिरव्या रत्नासारखा दिसू लागतो.चिंचेला एप्रिल-जून महिन्यात फुलं धरू लागतात.त्या फुलांबरोबर दिसू लागतातबगळे-ढोकरी-पाणकावळे यांचे गोदे.ग्रहनक्षत्रांनी निळं आकाश जसं शोभावं तसं पांढऱ्या-बदामी-काळ्या पक्ष्यांनी हे वैडूर्य मण्यांचे घुमट शोभू लागतात ज्ञानेश्वरांनी अशा अद्भुत सारंगागाराचे-हेरॉन्री मोठे मार्मिक वर्णन केले आहे;

अहो आकाशाचिये खोळे। दिसती ग्रहगणाची कुळे।

का महावृक्षी अविसाळे। पक्षिजातीची ।।

बगळे-ढोकरी हे प्रामुख्याने चिंचेच्या झाडावरच का घरटी करतात,हे पक्षिशास्त्रातील कोडं आहे.शेपन्नास झाडांपैकी काही मोजक्या झाडांवरच त्यांची विपुल घरटी का असतात हेही पुन्हा एक गूढ आहे.अशी सारंगागारे नवेगाव राष्ट्रीय उद्यानातील जांभडी व पवनी या नवेगाव तलावाकाठच्या गावात आढळून आली.तसेच इटियाडोहाच्या परिसरातील बोंड गाव व इतर गावांतही दिसून आली.जांभडी येथील सारंगागार नवेगाव राष्ट्रीय उद्यानाचे भूषण आहे,तर त्या गावच्या समृद्धीचे प्रतीक आहे.त्या गूढविस्तीर्ण जलाशयाकडे पाहात राहावं ! सूर्य अस्ताला गेला असला तरी तो स्वयंभू जलाशय कुठल्यातरी अनामिक तेजाने उजाळलेला वाटतो.पाण्यात पडलेल्या हिरव्यानिळ्या पर्वतमालांच्या छाया संधिप्रकाशात मनाला मोह पाडतात.

गूढ रम्य वाटणाऱ्या झीलानी व बोडीतून ढोकरी सारंगागाराकडे थव्याथव्यांनी उडताना,त्यांच्या वाक्-वाक् या स्वराने सायंतन शांततेत नाद-माधुरी ओतीत असतात.पवनी-जांभडी भागातील तलावाकाठचे सौंदर्य अवर्णनीय आहे.हिरव्यागार देवधानांनी रेखांकित असा हा तलावाचा किनारा पुढे जाऊन एका विस्तीर्ण झीलानीत विस्तारला आहे.त्याचा परिसर गूढ बोडींनी व्यापला आहे.ह्या हिरव्यागार पसाऱ्यावर दृष्टी ठरत नाही, इतके ते विशाल आहे.पूर्वेकडील हिरवेगार देवधान व पश्चिमेकडील पर्वतमालांच्या चिमटीत असल्यागत वाटणारा तो जलाशय अशा वेळी सागरातील खाडीसारखा दिसू लागतो.अशा या शांत,अद्भुतसमयी ढोकरी जांभडी गावाकडे रांगेने उंच आकाशातून उडू लागतात.त्यांच्या रांगाचे आकार कधी अर्धत्रिकोणासारखे तर कधी उभी रांग तर कधी आडवी रांग असे दिसतात.ढोकरी हा हा म्हणता नजरेआड होतात.


जांभडी गावच्या त्या चिंचांवर लक्षावधी ढोकरी व बगळे जमतात.ती झाडे या पांढऱ्या व बदामी पाखरांमुळे शोभू लागतात.प्रत्येक घरट्यागणिक असलेली तीन-चार पिले आईबापांच्या आगमनाची चाहूल लागताच विलक्षण कच्-कच् कच्-कच् आवाज करू लागतात. सूर्यास्तानंतर काही काळ ऐकू येणारा त्यांचा कोलाहल हळूहळू दिवेलागणीबरोबर शांत होऊ लागतो.

सकाळी मात्र हे सारंगागार शांत असते.जवळच्या झीलानी व बोडीतून बगळे-ढोकरी पिलांसाठी चारा घेऊन येतात.चारा घेण्यासाठी पिलांची कोण धडपड चालते.नुकतीच आपल्या पायावर उभी राहू शकणारी ती पिले विलक्षण धडपडीने तोल जाऊन खाली तर पडणार नाहीत ना असे वाटते !

सारंगागारे बहुधा गावातील चिंचेच्या झाडावरच असतात.गावात असलेल्या चिंचेच्या झाडांपैकी निवडक वृक्षांवरच ते आपले निवासस्थान बनवून घरटी बांधतात. तेथेच शेकडो वर्षे पिढ्यान्पिढ्या फुलतात,फळतात.पूर्वी गावातून दाट सावली व फळांसाठी चिंचेच्या झाडांची निवड केली जाई.चिंचेच्या फांद्या दाट व लवचिक असतात व पिसाप्रमाणे दिसणारी हिरवी पाने विपुल असतात.त्या घनदाट पालवीतून त्यांची नवजात पिले खाली जमिनीवर पडण्याची शक्यता कमीच. गावाबाहेर रस्त्याच्या कडेने असलेल्या चिंचेवर ते घरटी बांधत नाहीत.कारण तिथे दिवसा कावळे,मोरघारी त्यांची अंडी खातात तर रात्री घुबडे व वटवाघुळांचा त्यांना मोठा उपद्रव होतो. हा त्रास टाळायचा तर गावचा आश्रय घेणेच त्यांना योग्य वाटत असावे.

परंतु तेराव्या शतकात झालेला हंसदेव हा जैनमुनी 'मृगपक्षिशास्त्र' या संस्कृत ग्रंथात याविषयी लिहितो की,'वाघाची डरकाळी नव्हे,तर नुसता हुंकार ऐकूनही बगळे ढोकरी भितात.' त्यामुळे ढोकरी बगळ्यांची घरटी जंगलातील वृक्षावर न आढळता ती गावात किंवा गावानजीकच्या सुरक्षित राईत का दिसून येतात याचे रहस्य समजून येईल.

सकाळी उठून पाहावे तो घराच्या अंगणात-परसात पक्ष्यांची शीट पडलेली दिसते.परसात असलेला भाजीपाला व अंगणातील फुलझाडे ह्या खताने जोमाने वाढतात.तिथल्या जमिनीचा कस कधीच कमी होत नाही.पक्ष्यांची शीट गोळा करून धीवर माशांना घालतात.पक्ष्यांची शीट हे माशांचे आवडते खाद्य आहे. त्यांना तळ्यात खूप मासे मिळतात.ह्या चिंचेवर हे पक्षी राहिले नसते तर रात्री त्यांना हिरवा-निळा-काळा अंधार खायला उठला असता.परंतु ह्या आनंददायी पक्ष्यांनी त्या वृक्षांची तशीच गावची समृद्धी द्विगुणित केली आहे, जंगलातील एकट्यादुकट्या चिंचेवर किंवा रस्त्याच्या दुतर्फा मैल न् मैल असलेल्या चिंचेवरही हे पक्षी घरटी करीत नाहीत याचे आश्चर्य वाटते.ज्या चिंचेच्या राईत गावे वसली आहेत त्यावरच हे पक्षी घरटी बांधतात. चिंचेबद्दल चांगल्या-वाईट लोककथा ऐकण्यात येतात. चैतन्य महाप्रभूना या वृक्षाखालीच बोध प्राप्त झाला व हा चिंचेचा वृक्ष आज वृंदावनात आहे असे सांगतात.तमिळ भाषेत एक म्हण आहे 'भुताशी लग्न झाले तर चिंचेच्या झाडावर चढावे लागते.' चिंचेच्या झाडावर चढणे मोठे कठीण असते.त्याच्या फांद्या काड्या इतक्या विपुल,

घनदाट व चिवट असतात की,त्यातून पक्ष्यांचे शत्रू असलेल्या सापाचादेखील शिरकाव होत नाही. यामुळे त्यांच्या घरट्यांना नैसर्गिक तक्तपोसच मिळतो. अशा सुरक्षित चिंचेच्या कडेकोट किल्ल्यात आश्रयाला राहावयास पक्ष्यांना आवडेलच.(जंगलाचं देणं,मारुती चितमपल्ली, साहित्य प्रसार केंद्र, सीताबाई,नागपूर)

परंतु आपल्या पूर्वजांनी ज्या व्यावहारिक कल्पकतेनं गावची रचना करून चिंचेची झाडे वाढविली ते वैभव आता प्रत्येक गावातून हळूहळू नष्ट होत आहे.पक्ष्यांची शीट घरादारावर पडते,त्याचा घाण वास येतो म्हणून त्या झाडाच्या मोठमोठ्या फांद्या तोडण्यात येत आहेत.परंतु त्यापासून जे फायदे होतात त्या मानानं त्रास काहीच नाही.वाऱ्या-वादळापासून गावाचं रक्षण करणाऱ्या ह्या वृक्षांची तोड अविचारानं चालू आहेच.

निमगावात मी एक भयानक दृश्य पाहिलं.एका धीवरानं तर बगळ्याढोकरीची अंडी टोपलीभर गोळा केली होती.

मी विचारलं,'ह्याचं काय करणार?'

तो म्हणाला,बाजारात ती विकणार.'

हॉटेल-खाणावळीतून ही अंडी कोंबड्यांच्या अंड्यांबरोबर भेसळ करून लबाड व्यापारी ती अन्नात वापरतात.ह्या पक्ष्यांची अंडी आरोग्याला,अतिशय उष्ण व अपायकारक असतात.त्यापासून पोटाच्या अनेक व्याधी होतात.तो धीवर स्वतः पोटदुखीने जर्जर झालेला मी पाहिला.

चिंचेची झाडं भंडारा जिल्ह्यातील कल्पवृक्ष आहेत.चिंचा माघ व फाल्गुन या महिन्यात पिकून तयार होतात.

चिंचा बहुउपयोगी आहेत.चिंचेमध्ये ज्या बिया असतात त्यास चिंचोके म्हणतात.चिंच भाज्या वगैरे बहुतेक पदार्थात घालावी लागते.भातावर घेण्याकरता चिंचेच्या कोवळ्या पाल्याची भाजी करतात,फुलांची चटणी करतात.रेशीम रंगविण्यासाठी चिंचेच्या पानांचा उपयोग होतो.चिंचोके गरीब लोकांचे अन्न आहे.सूत, ताग व लोकरीच्या धाग्यासाठी चिंचोक्यापासून खळ करतात.

त्यांचे उत्तम तेल निघते.तेलाचा उपयोग बाहुल्या व मूर्ती रंगविण्यासाठी करतात.चिंचेचे लाकूड चिवट व टिकावू असते.त्यापासून बैलगाड्यांची चाके व कुऱ्हाडीचे दांडे करतात.तेलाच्या घाणी व उसाचे चरक यांचे बरेच भाग ह्या लाकडाचे बनविलेले असतात. चिंचेच्या रूपानं गावात जणू आरोग्य नांदते.तो नित्य औषधे देणारा वैद्यच वाटतो.मूळव्याध,परमा,पांडूरोग, खोकला,विंचवाचा दंश,क्षतक,शूळ देवीचा आजार, उंदराचे विष,अतिसार,

डोळे येणे,अपचन,भूक कमीहोणे,हिंगुलाचेविष,निवडुंगाचे विष,बैलाचा पाय सुजणे, कानदुखी,अरुची व पित्त,बद्धकोष्ठ,रूईचे विष,भांगेवर उतारा व मोडशी इत्यादी अनेक विकारावर पाने,फुले, चिंचा,

चिंचोके व झाडाची साल वनौषधी म्हणून वापरतात.ही त्यांची बहुमोल उपयुक्तता पाहून राज्य सरकारनं आता चिंचेची झाडं तोडण्यावर बंदी घातली आहे.ती झाडे तोडणं गुन्हा आहे.ज्या चिंचेवर बगळे ढोकरी इत्यादी पक्षी वर्षानुवर्षे घरटी करतात अशी सारंगागारे असलेली झाडं तोडणं तर फारच गंभीर गुन्हा आहे. अशा गुन्हेगारांना दोन हजार रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो.

♀♀♀ समाप्त ♀♀♀