मी कीटकशास्त्रज्ञ नाही,परंतु पक्ष्यांच्या भक्ष्यांचा अभ्यास करताना कीटकांच्या सृष्टीकडे माझं लक्ष वेधलं गेलं.जेव्हा त्यांच्या अद्भुत व गूढ जीवनाचा उत्तरोत्तर परिचय होत गेला,
तेव्हा वाटलं आपणदेखील हेन्री जीन फेबर या कीटकशास्त्रज्ञाप्रमाणे सारं आयुष्य कीटकांचा अभ्यास करायला हवा होता.
पक्षिनिरीक्षणाकरिता जंगलात तसंच पाण्याच्या काठानं खूप हिंडावं लागतं.अशा भटकंतीत मला झालेलं हे कीटकसृष्टीचं दर्शन :
पाणकोळी : श्रावण महिन्यात नवेगाव सरोवराकाठच्या झिलाणीतून डोंगीनं भटकण्यात मोठा आनंद असतो. जिकडेतिकडे हिरवंगार दिसत असतं.झिलाणीतील देवधानाला लोंब्या आलेल्या असतात.देवनळांची बेटं हवेत डोलत असतात.परळ नावाच्या पाणवनस्पतीला बी धरू लागतं.
आवळ्याच्या पानासारख्या दिसणाऱ्या पिटुंडीच्या फांद्या आपल्याच ओझ्यानं पाण्यावर ओणावतात.
डोंगी संथपणे या पाणवनस्पतीच्या गुंतावळीतून बाहेर निघते.
मधूनच सरोवराचं नितळ पाणी दिसू लागतं.या नितळ पाण्याखाली चिला नावाच्या वनस्पतीचं जाळं जिकडेतिकडे पसरलेलं दिसतं.
त्यामुळे पाण्याचा रंगही हिरवा-निळा दिसतो.
घनदाट जंगलातून जाताना,दोन झाडांच्या बुंध्यांच्या आश्रयानं जाळी बांधून सावजाची वाट पाहणारे देवकोळी मी पाहिलेत.
रानात हिंडताना जमिनीतील छिद्रात जाळं विणून झाडांआड बसून सावटीची वाट पाहत असलेले पारधी कोळी पायाजवळ आढळून यायचे.परंतु पाणकोळी बघण्याचा योग आला नव्हता. ती संधी मला अनायासे मिळाली.डोंगी चालविणाऱ्या ढिवराला ती स्थिर करण्याकरिता सांगितलं.नितळ पाण्यात पोहत असलेल्या पाणकोळ्याकडे मी पाहत होतो.पोट व पायाखाली हवेचा बुडबुडा धरून पाणकोळी पोहत होता.ती त्याची तऱ्हाच मुळी अभूतपूर्व होती.त्यानं मला आणखीन एक आश्चर्याचा धक्का दिला.
पाण्याच्या पृष्ठभागावर तरंगत असलेल्या चिला वनस्पतीच्या आधारानं त्यानं घंटीच्या आकाराचं जाळं विणलं होतं.
पाण्याच्या पातळीवर येऊन बुडबुड्यांना पाय व पोटाखाली पकडून त्या जाळीत तो साठवीत होता.जाळं बुडबुड्यांनी भरेपर्यंत त्याचं हे कार्य न कंटाळता चालू होतं.बुडबुड्यांच्या रूपानं अस्तित्वात असलेल्या प्राणवायूचा उपयोग करून तो त्या जाळ्यात सहज राहतो.
विणीच्या काळात तो घंटीच्या आकाराचं दुसरं एक जाळं आपल्या शेजारीच बांधतो.दोहोत एक गुप्त दार असतं.त्यातून त्याला मादीच्या जाळीत प्रवेश करता येतो.नंतर मादीच्या जाळीची भिंत तो तोडून टाकतो. त्यामुळे पाण्याचे बुडबुडे तिच्याही घरात प्रवेश करतात. काही दिवसांनी मादी अंडी घालते.अंड्यांतून पिलं बाहेर आल्यावर ती त्या घरातील एकेका बुडबुड्यावर स्वार होऊन आनंदानं जलविहार करू लागतात.हे दृश्य खरोखरच मोठं अद्भुतरम्य असतं. वाटतं,निसर्गानं आपली अशी रहस्यं जमिनीपेक्षा पाण्यातच अधिक लपवून ठेवली आहेत.ती एखाद्याला प्रयत्नानंच दृष्टीला पडतात.
तांबड्या मुंग्या : त्या दिवशी जंगलातल्या पायवाटेनं जाताना मोहाच्या झाडावर बऱ्याच चावऱ्या तांबड्या मुंग्या दिसल्या.अशा झाडाखालून जाताना त्या अंगावर पडतात आणि अशा काही चावा घेतात की, आपल्या अंगाची आग आग होते.मी जवळून पाहिलं तर त्या पानांचं घरटं बांधण्याच्या कामात गर्क होत्या.काही मुंग्या साखळी करून पानाची घडी घालीत होत्या. पानाच्या कडा त्यांनी जबड्यात धरल्या होत्या.जिथे पानं एकमेकाला चिकटली होती,
तिथे त्यांना जोडण्याचं काम मोठ्या जलद गतीनं करीत होत्या.
स्वतःचं एक अर्भक तोंडात धरून ती मुंगी ह्या जुडाईवर त्याला घासत होती. त्यातून पांढरा चीक बाहेर येत होता.डिंकानं चिकटवावीत तशी पानं एकमेकांना चिकटत होती.
हे पानाचं गोलाकार घरटं या तांबड्या मुंग्यांसाठी नव्हतं, तर त्या आपल्या गाईंसाठी गोठा बांधीत होत्या.मातकट रंगाचे मावा नावाचे कीटक जंगलात विपुल सापडतात. वनस्पतीतील रस शोषून घेताना हे मावा कीटक त्यातून आवश्यकतेपेक्षा अधिक साखर शोषून घेतात.जास्त असलेली साखर पोटावर असलेल्या सूक्ष्म नळीतून बाहेर येऊ लागते.या द्रवाला मावा म्हणतात.मावा रस मुंग्यांना खूप आवडतो.जसं शेतकरी गाईचं दूध काढतो तसं मुंग्या माव्याला दोहतात.मुंगीनं आपल्या स्पर्शिकेनं माव्याच्या नलिकेवर आघात करताच त्यातून गोड द्रव बाहेर येऊ लागतो.
या पानाच्या गोठ्यात मुंग्या मावा कीटकांना आणून पाळतात.या कीटकांची कमतरता कधी मुंग्यांना जाणवत नाही.कारण माव्याची अंडी या गोठ्यात आणून साठवितात.त्यातून जन्माला येणाऱ्या मावा कीटकापासून सातत्यानं गोड द्रवाचा पुरवठा होत असतो.
एखाद्या धंदेवाईक गवळ्याप्रमाणे काही जातींच्या तांबड्या मुंग्या झाडावर उंच ठिकाणी फूटबॉलएवढ्या आकाराचं गोल घरटं बांधून त्यावर मातीचा गिलावा करतात.त्यात या गाईंना ठेवतात. गाईंसाठी लागणारा पानांचा चारा मुंग्या तोंडात धरून घराकडे परत येताना दिसतात.
कोणालाही जवळपास येऊ न देणाऱ्या या रानटी,क्रूर मुंग्या तांबड्या सुतार पक्ष्याला मात्र आपल्या घरट्यात आसरा देतात.इतर सुतार पक्ष्यांप्रमाणे तांबड्या सुताराची चोच लांब व मजबूत नसल्यामुळे साहजिकच त्याला झाडाच्या बुंध्यात छिद्र पाडून आपलं घरटं करता येत नाही.म्हणून हा पक्षी त्या मुंग्यांच्या घरट्याला चोचीनं छिद्र पाडून त्यात आपला खोपा बांधतो.या त्यांच्या विलक्षण सहजीवनाचं गूढ मात्र अद्यापि पक्षिशास्त्रज्ञांना देखील उलगडता आलं नाही.
पाणकीटक : उन्हाळ्याचे दिवस.मी जंगलातून हाथी पागडीच्या पाऊलवाटेनं खाली उतरलो.बराच वेळ उन्हातून चढउतार करीत फिरत असल्यामुळे मला खूप तहान लागली होती.या डोंगराच्या पायथ्याला स्वच्छ पाण्याचा झरा असल्याचं मला माहीत होतं.
मी जसा पायथ्याजवळ आलो,तसा झरा वाहत असलेला मंजूळ आवाज कानी पडला.जवळ जाऊन पाहतो तो दोन काळ्या शिळांच्या फटीतून करंगळीएवढी पाण्याची धार खाली वाळूत पडत होती. खाली जाऊन पाहिलं तर,तो झिरपलेला झरा एका नितळ पाणझरीत पडत होता.त्यात काही पाणनिवळ्या पाण्यावरून अलगदपणे इकडून तिकडे तरंगताना दिसल्या.त्यांच्या सावल्या तळातल्या वाळूत पडल्या होत्या.इतक्यात वाटाण्याएवढे काळ्या रंगाचे, चपटे पाणकीटक दगडांच्या फटीफटींतून बाहेर येऊ लागले.थोड्याच वेळात त्यांचा थवा पाण्यावर तरंगू लागला.
बराच वेळ मी त्यांच्या क्रीडेकडे पाहत होतो.
काही लहान मासोळ्या तळात विसावल्या होत्या. त्यातील एक मासोळी पोहत पुढे आली.तोच सारे पाणकिडे तिच्यावर तुटून पडले.तिच्या मांसाचे लचके तोडून खाऊ लागले.शेवटी मासोळीचा फक्त सांगाडा तेवढा तरंगताना दिसला.हे सारं नाट्य पाहून मी आश्चर्यचकित झालो.
पाणी स्वच्छ वाटत असलं तरी गाळून घेतल्याशिवाय आम्ही वनाधिकारी असं पाणी कधी पीत नाही.ती साधनसामग्री माझ्याजवळ नव्हती. मला कबीराचा दोहा आठवला :
गुरु जानके कीजिये। पानी छानके पीजिये ।।
इतक्यात समोरच्या रस्त्यावर उभ्या असलेल्या जीपचा आवाज येताच मी तिकडे धाव घेतली.
झुलतं घर : एकदा बाभूळ-वनातून हिंडत असता बाभळीच्या फांदीला लटकलेलं हाताच्या करंगळीएवढ्या लांबीचं बंडल चालू लागल्याचं पाहिलं. चेल पतंगाच्या सुरवंटांनी काट्यांपासून बनविलेला तो कोश होता.अशा प्रकारची घरं बांधण्यात ते मोठे कुशल असतात.
सुरवंट आपलं झुलतं घर काट्यांनी बांधताना पाहणं मोठं मनोरंजक असतं.पहिल्यांदा सुरवंट स्वतःभोवती अत्यंत चिवट,
नळीच्या आकाराचा कोश विणतो. कोशाभोवती बाभळीच्या काट्यांचं आवरण असतं.मी त्या सुरवंटाच्या कारागिरीचं निरीक्षण करीत होतो. सुरवातीला सुरवंटानं कोशाचं टोक रेशमाच्या धाग्यानं फांदीला नीट बांधलं.नंतर काट्यांभोवतालची बारीक पानं कुरतडून टाकली.कोशासहित तो काट्यांजवळ पोचला.तिथे पुन्हा कोश अडकविला.काटा तोंडाने कुरतडून त्याचा तुकडा केला.तो लगेच कोशाच्या प्रवेशद्वाराजवळ चिकटविला.पुन्हा तो आत गडप झाला. नंतर कोशात विलक्षण हालचाल होत असल्याचं बाहेरून दिसत होतं.अचानक तो कोशाच्या दुसऱ्या छिद्रातून डोकावला.
तोडलेला काटा त्यानं पुन्हा तिथे नीट लावून घेतला.पुढच्या तीन जोडीच्या पायानं तोडलेला काटा तो इकडून तिकडे हालवीत होता. आतून विणीचं काम करून काटा पक्का बसवीत होता. नंतर ते छिद्र त्यानं आतून बंद केलं.
कीटक सृष्टीतील हा वास्तुशास्त्रज्ञच,प्रत्येक काट्याची लांबी मोजून घ्यावी,त्यात आपणांला लांबीत कुठेही फरक आढळून येणार नाही.बाभळीच्या काट्यांत असणाऱ्या या कोशाला रंगगोपनामुळे संरक्षण मिळतं.
मधमाशा व गांधीलमाशा यांच्याप्रमाणे मुंग्यादेखील सामाजिक जीवन जगतात,मानवानं मुंग्यांची बुद्धिमत्ता व उद्योगप्रियता यांचं कौतुक केलं आहे.परंतु फारच कमी लोकांना माहीत आहे की,
माणसांप्रमाणे मुंग्यादेखील अनेक प्रकारची कामं पार पाडू शकतात. त्यांच्या प्रत्येक वारुळात सुतार,गवंडी,वैद्य,शेतकरी, परिचारिका,शिपाई आणि सैनिक अस्तित्वात असतात
पानं कापणाऱ्या मुंग्या : पानं कापणाऱ्या (लीफ कटिंग) मुंग्या आणि एका जातीची अळंबी (फंगस) यांच्यात अद्वितीय असं सहजीवन आहे.या मुंग्यांना कात्रीसारखे जबडे असतात.त्यांच्या साह्यानं त्या 'व्ही' आकारात पानं कापतात.नंतर ती पानं वारुळात नेली जातात.कित्येकदा अशी वारुळं मैलभर अंतरापर्यंत असू शकतात.एक मुंगी झाडाची पानं कापून जमिनीवर टाकते.दुसरी ती वारुळाकडे घेऊन जाते.काही वेळानं त्या आपल्या कामाची अदलाबदल करतात.
अशा मुंग्यांची वारुळं आकारहीन व उंच असून त्यांचा विस्तार वीस पंचवीस फुटांच्या मध्यरेषेत असतो.
या वारुळांत प्रवेश करण्यास बिळं असतात.वारुळात प्रवेश केल्यावर उतरत्या अशा वाटेवर पानं गोळा केली जातात.या उतरत्या वाटा वातानुकूलित असतात.गोळा केलेल्या पानांचं चर्वण करून त्यांचे बारीक तुकडे करण्याचं काम कामकरी मुंग्या करतात.काही पानांचे तुकडे जमिनीवर लावून त्यांचं रोपवन तयार करतात. त्यांना खत घालतात.
निळावंती,मारुती चितमपल्ली,साहित्य प्रसार केंद्र,सीताबर्डी,नागपूर
मुंग्या एवढा खटाटोप का करीत असाव्यात असा शास्त्रज्ञांना प्रश्न पडतो.वारुळातील तापमान वाढावं म्हणून? त्यामुळे त्यांची अंडी उबविली जावीत म्हणून? पानाचं रासायनिक विघटन होऊन आतील तपमान वाढतं असं शास्त्रज्ञांचं अनुमान होतं.१८७४ साली मुंग्यांच्या या कृतीचं खरं कारण शोधून काढण्यात आलं. पानांची लागवड करताच त्यावर अळंबी वाढू लागतात. त्यावरील अनेक गुठळ्यांचं छत पाहिल्यावर कोबी फुलाची आठवण होते.या अळंब्यांचा उपयोग मुंग्या आपली पिलं वाढविण्यासाठी करताततसंच त्यांचा उपयोग पानं कापणाऱ्या प्रौढ मुंग्यांनादेखील होतो. वारुळात तसंच अन्यत्र कुजलेल्या वनस्पतींवर वाढणाऱ्या अळंब्यांत कसलंही साम्य नाही.
आणखी एक आश्चर्याची गोष्ट म्हणजे ही अळंबी वारुळाबाहेर कुठेच आढळून येत नाही.ती फक्त पानं कापणाऱ्या मुंग्यांच्या वारुळातच वाढते.या मुंग्यांनी त्यांची शेती केली नाही तर ती नष्ट होईल,म्हणजे या अळंबीशिवाय मुंग्यादेखील जगू शकणार नाहीत.या अळंबीतून निर्माण होणारा द्रवपदार्थच मुंग्या पचवू शकतात.अशा प्रकारचं उभयतांमधील सहजीवन म्हणजे एकमेकांचा प्राणच आहे.सहजीवनाचं हे सातत्य मुंग्या पिढ्यान् पिढ्या चालू ठेवतात.अनुनयकाळात पानं कापणारी राणी मुंगी अळंबीची गोळी तोंडाखालच्या पिशवीत घेऊन वारुळाबाहेर पडते,राणी मुंगीचे पंख झडून जाताच ती जमिनीत छिद्र पाडून त्यात अळंबी सोडते.नंतर ती अंडी घालावयाला बसते.कितीही भूक लागली तरी ती काही खात नाही.थोड्याच अवधीत अंड्यातून जन्माला आलेल्या कामकरी मुंग्या पानं गोळा करून लागवडीला सुरवात करतात.राणीनं स्वतःबरोबर आणलेल्या अळंबीचं बीजाणू पेरलं जातं.साऱ्या नवीन वसाहतीला पुनश्च अन्न मिळू लागतं.
हे अळंबीचं बीजाणू कोठून येतं? पानं कापणाऱ्या मुंग्यांच्याच वारुळात ते का वाढतं ? दुसऱ्या प्रकारच्या वनस्पतींवर मुंग्या का जगू शकत नाहीत? या सर्व प्रश्नांची उत्तरं अजून तरी सापडलेली नाहीत.मुंग्यांना त्याची पर्वा नाही.युगानुयुगं जिवंत राहण्याची किमया फक्त त्यांनाच ठाऊक आहे.
●●● समाप्त ●●●