* विजय गायकवाड | Vijay Gaikawad

live

नमस्कार आपले स्वागत आहे. मी पुस्तके आणि मित्रांवर पैसे खर्च करतो,माझ्याकडे दगड आणि विटांवर खर्च करण्यासाठी पैसे नाहीत.- रस्किन बाँड.ही थोर माणसं व त्यांचे विचार मला पुस्तकात भेटलीत.ती भेटली आणि त्यांनी सांगितले कि, प्रत्येक दिवशी असं काही तरी करा की,ते तुम्हाला अधिक सुंदर उद्याच्या दिशेने खूप लांबवर घेऊन जाईल."- डोग फायरबाऊ.' सर्वियन कादंबरीकार मिलोराद पावीच यांचे एक वाक्य आहे ते म्हणतात - जोवर जगात पुस्तक वाचणाऱ्या वाचकांची संख्या बंदूकधारी सैनिका पेक्षा अधिक आहे तोवर काळजीच काहीच कारण नाही.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात.पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये.म्हणून अविरतपणे प्रयत्न करणारे मार्गदर्शक, मित्र धावून येतात.प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,डॉ.दीपक शेटे,आ.भरत बुटाले,प्रा.सर्जेराव राऊत,सुभाष ढगे,अनिल फारणे,डॉ.सुधीर सरवदे ,विश्वास खाडे, विनायक पाटील,संजय कुंभार,सतीश खाडे,मनोहर सुर्वे,गणेश खंदारे,तात्या गाडेकर, दादासाहेब गाडेकर, दादासाहेब ताजणे, पुस्तकातील घटना प्रसंग सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील यांनी केलेले आहे. मला लिहिण्याची प्रेरणा देणारी पुस्तके,लेखक,प्रकाशक,मित्र ही जगावेगळी माणसं माझ्या जीवनातील महत्वाचा टप्पा आहेत.... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ.मेघा गायकवाड, चिरंजीव मयान,माझ्या धावण्यातील गुरुवर्य नामदेव बरुरे,लुल्ला शेख मोठी ताई ,लहान ताई जयश्री शिंदे या सर्वांचेच मनापासून आभार व धन्यवाद मॅट्रिक फेल विजय गायकवाड

3/26/26

कीटकांचं अद्‌भुत जग / The wonderful world of insects

मी कीटकशास्त्रज्ञ नाही,परंतु पक्ष्यांच्या भक्ष्यांचा अभ्यास करताना कीटकांच्या सृष्टीकडे माझं लक्ष वेधलं गेलं.जेव्हा त्यांच्या अद्भुत व गूढ जीवनाचा उत्तरोत्तर परिचय होत गेला,


तेव्हा वाटलं आपणदेखील हेन्री जीन फेबर या कीटकशास्त्रज्ञाप्रमाणे सारं आयुष्य कीटकांचा अभ्यास करायला हवा होता. 


पक्षिनिरीक्षणाकरिता जंगलात तसंच पाण्याच्या काठानं खूप हिंडावं लागतं.अशा भटकंतीत मला झालेलं हे कीटकसृष्टीचं दर्शन :

पाणकोळी : श्रावण महिन्यात नवेगाव सरोवराकाठच्या झिलाणीतून डोंगीनं भटकण्यात मोठा आनंद असतो. जिकडेतिकडे हिरवंगार दिसत असतं.झिलाणीतील देवधानाला लोंब्या आलेल्या असतात.देवनळांची बेटं हवेत डोलत असतात.परळ नावाच्या पाणवनस्पतीला बी धरू लागतं.

आवळ्याच्या पानासारख्या दिसणाऱ्या पिटुंडीच्या फांद्या आपल्याच ओझ्यानं पाण्यावर ओणावतात.


डोंगी संथपणे या पाणवनस्पतीच्या गुंतावळीतून बाहेर निघते.

मधूनच सरोवराचं नितळ पाणी दिसू लागतं.या नितळ पाण्याखाली चिला नावाच्या वनस्पतीचं जाळं जिकडेतिकडे पसरलेलं दिसतं.

त्यामुळे पाण्याचा रंगही हिरवा-निळा दिसतो.


घनदाट जंगलातून जाताना,दोन झाडांच्या बुंध्यांच्या आश्रयानं जाळी बांधून सावजाची वाट पाहणारे देवकोळी मी पाहिलेत.

रानात हिंडताना जमिनीतील छिद्रात जाळं विणून झाडांआड बसून सावटीची वाट पाहत असलेले पारधी कोळी पायाजवळ आढळून यायचे.परंतु पाणकोळी बघण्याचा योग आला नव्हता. ती संधी मला अनायासे मिळाली.डोंगी चालविणाऱ्या ढिवराला ती स्थिर करण्याकरिता सांगितलं.नितळ पाण्यात पोहत असलेल्या पाणकोळ्याकडे मी पाहत होतो.पोट व पायाखाली हवेचा बुडबुडा धरून पाणकोळी पोहत होता.ती त्याची तऱ्हाच मुळी अभूतपूर्व होती.त्यानं मला आणखीन एक आश्चर्याचा धक्का दिला.


पाण्याच्या पृष्ठभागावर तरंगत असलेल्या चिला वनस्पतीच्या आधारानं त्यानं घंटीच्या आकाराचं जाळं विणलं होतं.

पाण्याच्या पातळीवर येऊन बुडबुड्यांना पाय व पोटाखाली पकडून त्या जाळीत तो साठवीत होता.जाळं बुडबुड्यांनी भरेपर्यंत त्याचं हे कार्य न कंटाळता चालू होतं.बुडबुड्यांच्या रूपानं अस्तित्वात असलेल्या प्राणवायूचा उपयोग करून तो त्या जाळ्यात सहज राहतो.


विणीच्या काळात तो घंटीच्या आकाराचं दुसरं एक जाळं आपल्या शेजारीच बांधतो.दोहोत एक गुप्त दार असतं.त्यातून त्याला मादीच्या जाळीत प्रवेश करता येतो.नंतर मादीच्या जाळीची भिंत तो तोडून टाकतो. त्यामुळे पाण्याचे बुडबुडे तिच्याही घरात प्रवेश करतात. काही दिवसांनी मादी अंडी घालते.अंड्यांतून पिलं बाहेर आल्यावर ती त्या घरातील एकेका बुडबुड्यावर स्वार होऊन आनंदानं जलविहार करू लागतात.हे दृश्य खरोखरच मोठं अद्‌भुतरम्य असतं. वाटतं,निसर्गानं आपली अशी रहस्यं जमिनीपेक्षा पाण्यातच अधिक लपवून ठेवली आहेत.ती एखाद्याला प्रयत्नानंच दृष्टीला पडतात.


तांबड्या मुंग्या : त्या दिवशी जंगलातल्या पायवाटेनं जाताना मोहाच्या झाडावर बऱ्याच चावऱ्या तांबड्या मुंग्या दिसल्या.अशा झाडाखालून जाताना त्या अंगावर पडतात आणि अशा काही चावा घेतात की, आपल्या अंगाची आग आग होते.मी जवळून पाहिलं तर त्या पानांचं घरटं बांधण्याच्या कामात गर्क होत्या.काही मुंग्या साखळी करून पानाची घडी घालीत होत्या. पानाच्या कडा त्यांनी जबड्यात धरल्या होत्या.जिथे पानं एकमेकाला चिकटली होती,

तिथे त्यांना जोडण्याचं काम मोठ्या जलद गतीनं करीत होत्या.

स्वतःचं एक अर्भक तोंडात धरून ती मुंगी ह्या जुडाईवर त्याला घासत होती. त्यातून पांढरा चीक बाहेर येत होता.डिंकानं चिकटवावीत तशी पानं एकमेकांना चिकटत होती.


हे पानाचं गोलाकार घरटं या तांबड्या मुंग्यांसाठी नव्हतं, तर त्या आपल्या गाईंसाठी गोठा बांधीत होत्या.मातकट रंगाचे मावा नावाचे कीटक जंगलात विपुल सापडतात. वनस्पतीतील रस शोषून घेताना हे मावा कीटक त्यातून आवश्यकतेपेक्षा अधिक साखर शोषून घेतात.जास्त असलेली साखर पोटावर असलेल्या सूक्ष्म नळीतून बाहेर येऊ लागते.या द्रवाला मावा म्हणतात.मावा रस मुंग्यांना खूप आवडतो.जसं शेतकरी गाईचं दूध काढतो तसं मुंग्या माव्याला दोहतात.मुंगीनं आपल्या स्पर्शिकेनं माव्याच्या नलिकेवर आघात करताच त्यातून गोड द्रव बाहेर येऊ लागतो.


या पानाच्या गोठ्यात मुंग्या मावा कीटकांना आणून पाळतात.या कीटकांची कमतरता कधी मुंग्यांना जाणवत नाही.कारण माव्याची अंडी या गोठ्यात आणून साठवितात.त्यातून जन्माला येणाऱ्या मावा कीटकापासून सातत्यानं गोड द्रवाचा पुरवठा होत असतो.

एखाद्या धंदेवाईक गवळ्याप्रमाणे काही जातींच्या तांबड्या मुंग्या झाडावर उंच ठिकाणी फूटबॉलएवढ्या आकाराचं गोल घरटं बांधून त्यावर मातीचा गिलावा करतात.त्यात या गाईंना ठेवतात. गाईंसाठी लागणारा पानांचा चारा मुंग्या तोंडात धरून घराकडे परत येताना दिसतात.


कोणालाही जवळपास येऊ न देणाऱ्या या रानटी,क्रूर मुंग्या तांबड्या सुतार पक्ष्याला मात्र आपल्या घरट्यात आसरा देतात.इतर सुतार पक्ष्यांप्रमाणे तांबड्या सुताराची चोच लांब व मजबूत नसल्यामुळे साहजिकच त्याला झाडाच्या बुंध्यात छिद्र पाडून आपलं घरटं करता येत नाही.म्हणून हा पक्षी त्या मुंग्यांच्या घरट्याला चोचीनं छिद्र पाडून त्यात आपला खोपा बांधतो.या त्यांच्या विलक्षण सहजीवनाचं गूढ मात्र अद्यापि पक्षिशास्त्रज्ञांना देखील उलगडता आलं नाही.


पाणकीटक : उन्हाळ्याचे दिवस.मी जंगलातून हाथी पागडीच्या पाऊलवाटेनं खाली उतरलो.बराच वेळ उन्हातून चढउतार करीत फिरत असल्यामुळे मला खूप तहान लागली होती.या डोंगराच्या पायथ्याला स्वच्छ पाण्याचा झरा असल्याचं मला माहीत होतं.


मी जसा पायथ्याजवळ आलो,तसा झरा वाहत असलेला मंजूळ आवाज कानी पडला.जवळ जाऊन पाहतो तो दोन काळ्या शिळांच्या फटीतून करंगळीएवढी पाण्याची धार खाली वाळूत पडत होती. खाली जाऊन पाहिलं तर,तो झिरपलेला झरा एका नितळ पाणझरीत पडत होता.त्यात काही पाणनिवळ्या पाण्यावरून अलगदपणे इकडून तिकडे तरंगताना दिसल्या.त्यांच्या सावल्या तळातल्या वाळूत पडल्या होत्या.इतक्यात वाटाण्याएवढे काळ्या रंगाचे, चपटे पाणकीटक दगडांच्या फटीफटींतून बाहेर येऊ लागले.थोड्याच वेळात त्यांचा थवा पाण्यावर तरंगू लागला.

बराच वेळ मी त्यांच्या क्रीडेकडे पाहत होतो.


काही लहान मासोळ्या तळात विसावल्या होत्या. त्यातील एक मासोळी पोहत पुढे आली.तोच सारे पाणकिडे तिच्यावर तुटून पडले.तिच्या मांसाचे लचके तोडून खाऊ लागले.शेवटी मासोळीचा फक्त सांगाडा तेवढा तरंगताना दिसला.हे सारं नाट्य पाहून मी आश्चर्यचकित झालो.


पाणी स्वच्छ वाटत असलं तरी गाळून घेतल्याशिवाय आम्ही वनाधिकारी असं पाणी कधी पीत नाही.ती साधनसामग्री माझ्याजवळ नव्हती. मला कबीराचा दोहा आठवला :


गुरु जानके कीजिये। पानी छानके पीजिये ।।


इतक्यात समोरच्या रस्त्यावर उभ्या असलेल्या जीपचा आवाज येताच मी तिकडे धाव घेतली.


झुलतं घर : एकदा बाभूळ-वनातून हिंडत असता बाभळीच्या फांदीला लटकलेलं हाताच्या करंगळीएवढ्या लांबीचं बंडल चालू लागल्याचं पाहिलं. चेल पतंगाच्या सुरवंटांनी काट्यांपासून बनविलेला तो कोश होता.अशा प्रकारची घरं बांधण्यात ते मोठे कुशल असतात.


सुरवंट आपलं झुलतं घर काट्यांनी बांधताना पाहणं मोठं मनोरंजक असतं.पहिल्यांदा सुरवंट स्वतःभोवती अत्यंत चिवट,

नळीच्या आकाराचा कोश विणतो. कोशाभोवती बाभळीच्या काट्यांचं आवरण असतं.मी त्या सुरवंटाच्या कारागिरीचं निरीक्षण करीत होतो. सुरवातीला सुरवंटानं कोशाचं टोक रेशमाच्या धाग्यानं फांदीला नीट बांधलं.नंतर काट्यांभोवतालची बारीक पानं कुरतडून टाकली.कोशासहित तो काट्यांजवळ पोचला.तिथे पुन्हा कोश अडकविला.काटा तोंडाने कुरतडून त्याचा तुकडा केला.तो लगेच कोशाच्या प्रवेशद्वाराजवळ चिकटविला.पुन्हा तो आत गडप झाला. नंतर कोशात विलक्षण हालचाल होत असल्याचं बाहेरून दिसत होतं.अचानक तो कोशाच्या दुसऱ्या छिद्रातून डोकावला.

तोडलेला काटा त्यानं पुन्हा तिथे नीट लावून घेतला.पुढच्या तीन जोडीच्या पायानं तोडलेला काटा तो इकडून तिकडे हालवीत होता. आतून विणीचं काम करून काटा पक्का बसवीत होता. नंतर ते छिद्र त्यानं आतून बंद केलं.


कीटक सृष्टीतील हा वास्तुशास्त्रज्ञच,प्रत्येक काट्याची लांबी मोजून घ्यावी,त्यात आपणांला लांबीत कुठेही फरक आढळून येणार नाही.बाभळीच्या काट्यांत असणाऱ्या या कोशाला रंगगोपनामुळे संरक्षण मिळतं.


मधमाशा व गांधीलमाशा यांच्याप्रमाणे मुंग्यादेखील सामाजिक जीवन जगतात,मानवानं मुंग्यांची बुद्धिमत्ता व उद्योगप्रियता यांचं कौतुक केलं आहे.परंतु फारच कमी लोकांना माहीत आहे की,

माणसांप्रमाणे मुंग्यादेखील अनेक प्रकारची कामं पार पाडू शकतात. त्यांच्या प्रत्येक वारुळात सुतार,गवंडी,वैद्य,शेतकरी, परिचारिका,शिपाई आणि सैनिक अस्तित्वात असतात


पानं कापणाऱ्या मुंग्या : पानं कापणाऱ्या (लीफ कटिंग) मुंग्या आणि एका जातीची अळंबी (फंगस) यांच्यात अद्वितीय असं सहजीवन आहे.या मुंग्यांना कात्रीसारखे जबडे असतात.त्यांच्या साह्यानं त्या 'व्ही' आकारात पानं कापतात.नंतर ती पानं वारुळात नेली जातात.कित्येकदा अशी वारुळं मैलभर अंतरापर्यंत असू शकतात.एक मुंगी झाडाची पानं कापून जमिनीवर टाकते.दुसरी ती वारुळाकडे घेऊन जाते.काही वेळानं त्या आपल्या कामाची अदलाबदल करतात.


अशा मुंग्यांची वारुळं आकारहीन व उंच असून त्यांचा विस्तार वीस पंचवीस फुटांच्या मध्यरेषेत असतो. 


या वारुळांत प्रवेश करण्यास बिळं असतात.वारुळात प्रवेश केल्यावर उतरत्या अशा वाटेवर पानं गोळा केली जातात.या उतरत्या वाटा वातानुकूलित असतात.गोळा केलेल्या पानांचं चर्वण करून त्यांचे बारीक तुकडे करण्याचं काम कामकरी मुंग्या करतात.काही पानांचे तुकडे जमिनीवर लावून त्यांचं रोपवन तयार करतात. त्यांना खत घालतात.


निळावंती,मारुती चितमपल्ली,साहित्य प्रसार केंद्र,सीताबर्डी,नागपूर


मुंग्या एवढा खटाटोप का करीत असाव्यात असा शास्त्रज्ञांना प्रश्न पडतो.वारुळातील तापमान वाढावं म्हणून? त्यामुळे त्यांची अंडी उबविली जावीत म्हणून? पानाचं रासायनिक विघटन होऊन आतील तपमान वाढतं असं शास्त्रज्ञांचं अनुमान होतं.१८७४ साली मुंग्यांच्या या कृतीचं खरं कारण शोधून काढण्यात आलं. पानांची लागवड करताच त्यावर अळंबी वाढू लागतात. त्यावरील अनेक गुठळ्यांचं छत पाहिल्यावर कोबी फुलाची आठवण होते.या अळंब्यांचा उपयोग मुंग्या आपली पिलं वाढविण्यासाठी करताततसंच त्यांचा उपयोग पानं कापणाऱ्या प्रौढ मुंग्यांनादेखील होतो. वारुळात तसंच अन्यत्र कुजलेल्या वनस्पतींवर वाढणाऱ्या अळंब्यांत कसलंही साम्य नाही.


आणखी एक आश्चर्याची गोष्ट म्हणजे ही अळंबी वारुळाबाहेर कुठेच आढळून येत नाही.ती फक्त पानं कापणाऱ्या मुंग्यांच्या वारुळातच वाढते.या मुंग्यांनी त्यांची शेती केली नाही तर ती नष्ट होईल,म्हणजे या अळंबीशिवाय मुंग्यादेखील जगू शकणार नाहीत.या अळंबीतून निर्माण होणारा द्रवपदार्थच मुंग्या पचवू शकतात.अशा प्रकारचं उभयतांमधील सहजीवन म्हणजे एकमेकांचा प्राणच आहे.सहजीवनाचं हे सातत्य मुंग्या पिढ्यान् ‌पिढ्या चालू ठेवतात.अनुनयकाळात पानं कापणारी राणी मुंगी अळंबीची गोळी तोंडाखालच्या पिशवीत घेऊन वारुळाबाहेर पडते,राणी मुंगीचे पंख झडून जाताच ती जमिनीत छिद्र पाडून त्यात अळंबी सोडते.नंतर ती अंडी घालावयाला बसते.कितीही भूक लागली तरी ती काही खात नाही.थोड्याच अवधीत अंड्यातून जन्माला आलेल्या कामकरी मुंग्या पानं गोळा करून लागवडीला सुरवात करतात.राणीनं स्वतःबरोबर आणलेल्या अळंबीचं बीजाणू पेरलं जातं.साऱ्या नवीन वसाहतीला पुनश्च अन्न मिळू लागतं.


हे अळंबीचं बीजाणू कोठून येतं? पानं कापणाऱ्या मुंग्यांच्याच वारुळात ते का वाढतं ? दुसऱ्या प्रकारच्या वनस्पतींवर मुंग्या का जगू शकत नाहीत? या सर्व प्रश्नांची उत्तरं अजून तरी सापडलेली नाहीत.मुंग्यांना त्याची पर्वा नाही.युगानुयुगं जिवंत राहण्याची किमया फक्त त्यांनाच ठाऊक आहे.


●●● समाप्त ●●●

3/24/26

निंबोणीचं झाड करवंदी / Nimbus tree Karvandi

लहानपणी आम्ही भावंडे चांदण्या रात्री गच्चीत खेळत असू.आई एक अंगाई गीत गायची.ते मला अजून आठवते.


चांदोबा चांदोबा भागलास का ? 

लिंबोणीच्या झाडामागे लपलास का ? 

लिंबोणीचे झाड करवंदी, 

मामाचा वाडा चिरेबंदी.


कडूनिंबाचे झाड दिवसा फारसे आकर्षक दिसत नाही.

सायंकाळी त्याच्या सालीचा गर्द तांबूस रंग काळा दिसू लागतो आणि त्याची सुंदर हिरवी पानं निळ्या आकाशाच्या पार्श्वभूमीवर मोठी मनमोहक वाटतात.चांदण्या रात्री दिसणारे त्याचे राजन्वती रूप माझ्या मनातून इतकी वर्षं कधीच मावळलं नाही.


उत्तर भारतातील लोकगीतांतून निंबाचा वारंवार उल्लेख येतो.गावात प्रत्येक घरासमोर एखादं तरी निंबाचं झाड असतंच.ह्या वृक्षाच्या फांद्यांना झोका बांधून युवक-युवती एकत्रित येऊन गीत गात झोका घेत कालक्रमणा करतात.ही गीते बहुतेक शृंगारिक प्रेमाची असतात.


जुन्या काळी पायी मजल दरमजल करीत प्रवास करणारे पथिक प्रकृती चांगली राहावी म्हणून रात्री निंबवृक्षाखाली झोपत.निंबाच्या वृक्षाविषयी एक मजेदार गोष्ट सांगितली जाते.


दीर्घ काळ लांबच्या प्रवासाला निघालेला पती लवकर घरी यावा अशी पत्नीची इच्छा होती.तिनं वैद्याचा सल्ला घेतला.

वैद्यानं तिला सांगितलं की, तुझ्या पतीला सांग की,प्रवासात जाताना चिंचेच्या झाडाखाली झोपत जावं,आणि परतीच्या प्रवासात कडूनिंबाच्या झाडाखाली झोपावं.झालं,पती प्रवासाला निघाला.चिंचेच्या झाडाखाली झोपल्यानं माणसं आजारी पडतात.तो चिंचेच्या झाडाखाली झोपून लवकरच आजारी पडला.प्रकृती बरी नसल्यानं त्यानं पुढचा प्रवास रद्द केला.पत्नीच्या सल्ल्याप्रमाणं परतीच्या प्रवासात तो निंबाच्या झाडाखाली झोपायचा.घरी परत येईपर्यंत त्याची प्रकृती चांगली झाली.पती परत आलेला पाहून ती आनंदित झाली.


गावात घरोघरी आढळून येणारी निंबाची झाडं मुक्त प्रेमीजनांना कशी आवडणार ? हाल सातवाहनाच्या गाथा सप्तशतीत त्याचं प्रतिबिंब पडलं आहे.ही आरोग्यनिधीची झाडं गावाबाहेर एकान्ती असती तर ! पण ती असतात एक तर घरापुढे,रहदारीच्या रस्त्याला किंवा मंदिराच्या समोर.तिन्ही ठिकाणी प्रेमिकांची कुचंबणा.हा कल्पवृक्ष गाथा सप्तशतीतील नायिकांना विष वृक्षासारखा कडू वाटतोय.


पाटलाच्या पोरावर भाळलेल्या एकीनं निरोप पाठवला,'

पाटलाच्या पोरा,तू बायकोच्या तंत्रानं वागतोस व तिला भितोस;तू कडुनिंबाच्या झाडावरील किड्यासारखा आहेस.तू कोणावरही कृपा करीत नाहीस.आम्हाला तुझं दर्शनही होत नाही.तरी गाव तुझ्यासाठी झुरत आहे.'



धन उत्तम व्यवहारानं मिळवायचे असते.दुष्टाच्या पैशाची कशी वाट लागते पहा.


'दुष्टांनी द्रव्य संपादन केलं तर ते त्याचं दान कुणाला करतात ? अर्थात हलकटांनाच.निंबाची फळं पिकली तरी ती कावळेच खाणार.'


ग्रंथपंडिताला ती जीवनाचं रहस्य सांगताना म्हणते, 'हे धार्मिक,तू दुःशिक्षित आहेस.तू निंबाच्या किड्यासारखा आहेस.काय व्हायचे असेल ते होऊ दे,नरकात जाऊ,पण दोघेही बरोबर जाऊ.'


उंच,विशाल वाढणाऱ्या निंबाची पानं सदा हिरवीगार असतात.पानं कात्रीदार असून घनदाट असतात.निंबाचं मूळ उत्पत्तिस्थान ब्रह्मदेशात असलं तरी अमरकोशासारख्या प्राचीन ग्रंथात त्याचा उल्लेख आला आहे.


पारिभद्रे निम्बतरुर् मन्दारः पारिजातकः


कडुनिंबाचे चार प्रकार आहेत पारिभद्र,निंबतरू, मन्दार व पारिजातक.निंबाला पांढऱ्या रंगाची, मधाचा वास असलेली बारीक फुलं एकदा मार्च-एप्रिल महिन्यात व दुसऱ्यांदा पावसाळ्यात येतात.पिकलेली फळं पिवळीधमक दिसतात.

या फळांना लिंबोणी म्हणतात.पिकलेली रसाळ फळं कावळ्यांना खूप आवडतात.इतरही पक्षी व मधमाश्या निंबांच्या झाडाकडे आकर्षिल्या जातात.


त्याच्या अनेक उपयोगांवरून वैद्य त्यास भूलोकातील कल्पतरू म्हणतात प्राचीन आर्यऋषिवर्यांनी त्याच्या अलौकिक गुणाचा शोध लावून त्यास मोठे श्रेष्ठपद दिले आहे.त्याच्या सेवनानं अनेक व्याधींचे निर्मूलन होते.या वृक्षाची नुसती पानेच खाऊन राहिलेले तेजःपुंज आणि शक्तिमान असे काही विरक्त कधी कधी नजरेस पडतात.

निंबाची छाया घनदाट व गार करवंदी असते.निंबाचा वृक्ष फार जुनाट झाला म्हणजे त्याच्या खोडास शुद्ध चंदनाचा सुवास येतो


हा एकदा तोडला तरी पुन्हा त्याची मुळे फुटून त्याचा काही वर्षांनी मोठा वृक्ष होतो.पिंपळ व निंब या दोहोंची फारच मैत्री आहे.जेथे जेथे.पिंपळाचा पार असतो तेथे तेथे बहुतकरून निंबही असतो.


वृक्षाच्छादित मार्ग बनविण्यासाठी निंबाइतके योग्य झाड नाही.उन्हाळ्यात जेव्हा सावलीची जरूरी असते त्या वेळी निंब आपल्या करवंदी सावलीनं व सभोवतालच्या निरामय वातावरणानं प्रवाशांना आनंद देतो.राईत त्याची वाढ उंच होत नाही.मात्र हमरस्त्यावर झार्ड नजीकनजीक असल्यानं तो

उंच वाढत असला तरी सरळ कधीच नसतो.त्याला जेथून खालच्या भागातून फांद्या फुटतात त्या मोठ्या रेखीव व शोभादायक असतात.


जंगलाचं देणं,मारुती चितमपल्ली,साहित्य प्रसारक केंद्र,सीताबाई,नागपूर


कावळ्यांना आश्रय देणाऱ्या वृक्षांना ऋग्वेदात काकाम्बीर म्हटलं आहे.निंबवृक्षाची गणना अशा झाडांतच करायला हवी.निंबाच्या झाडावर कावळ्यांची अनेक घरटी दरवर्षी दिसून येतात. वैशाख महिन्यात या वृक्षावर कावळ्यांनी घरटी करणं पुढे सुकाळ असल्याचं सुचविते.एरव्ही कावळ्याचा आवाज किती कर्कश ! पण ज्यांनी ह्या काकाम्बीरावरील घरट्यात बसलेल्या कावळीचा आवाज ऐकला असेल तो त्या आवाजानं विचलित झाल्याशिवाय राहणार नाही. केवढा अद्भुत स्वर तिच्या कंठातून स्रवतो.


या वृक्षाच्या बाबतीत एक चमत्कार कधी कधी आढळून येतो.त्याच्या मोठ्या आडव्या फांदीतून एकाएकी ताडीसारखा पांढरा द्रव वाहू लागतो.असं होणं लोक अशुभ मानतात.ते स्रवणं काही दिवसांनंतर आपोआपच थांबतं.


लिंबोणीतील बियांपासून तेल काढतात.ते 'मारगोसा' या नावानं ओळखलं जातं.त्याचा उपयोग जंतुनाशक द्रव्ये औषधे बनविण्याकरिता होतो.वातावरील रोगात त्याचे तेल मालीश करण्याकरिता उपयोगात आणतात.


निंबाचे लाकूड टणक व टिकावू असल्यानं जहाजबांधणीत त्याचा उपयोग होतो.त्याच्या लाकडापासून खेळणी,शेतीची अवजारे व बैलगाड्या तयार करतात.


■■■ समाप्त 

3/22/26

जितराबं / jitrab

"जनावर लै हुशार ! छोट्या मालकांना असं कोलवलं की, त्यांना शिंग लागू दिलं नै का इजा होऊ दिली नै."


माई लगेच म्हणाल्या,"मग,आहेच माझी लक्ष्मी गुणाची! "


लक्ष्मीच्या पायगुणांनी वाड्यावरचा गोवंश वाढू लागला होता.एक दिवस बापू ओसरीवर पान खात बसले होते. मंदा,मुक्ता ओट्यावर मारवाड्यांच्या निम्मी,पुष्पाशी ठिक्कर ठिक्कर खेळत होत्या तर यशा त्याच्या मित्रांबरोबर डब्बा ऐसपैसमध्ये मग्न झाला होता. खेळता खेळता त्याला लंगडत वाड्याकडे येणारा टुबुक दिसला.

टुबुकचं खरं नाव कुणालाच माहीत नव्हतं. जेमतेम पाच फूट उंची असलेल्या टुबुकचा एक पाय सहा इंचांनी छोटा होता.

त्यामुळे तो लंगडत लंगडत चालायचा.त्यामुळे सगळं गाव त्याला 'टुबुक' म्हणायचं. टुबुक त्याच्या साथीदाराबरोबर हलकडी जोरदार वाजवायचा.कुस्त्यांच्या आखाड्यात पहिलवानाच्या खालोखाल टुबुकला महत्त्व असायचं.इतर वेळेला तो सिनेमांच्या जाहिरातींच्या त्रिकोणी ढकलगाड्यांसमोर हलकडी वाजवत असे.टुबुक त्याच्या दुडक्या चालीने महादेवाच्या देवळाच्या बाजूने गल्लीत शिरला.

यशा दत्तमंदिरासमोरच उभा होता.टुबुकने त्याच्याकडे बापूंची चौकशी केली.बापू वाड्यात आहेत कळल्यावर तो वाड्यात शिरला.टुबुक आपल्या घरात का गेला ह्या उत्सुकतेने यशाही त्याच्या पाठोपाठ गेला तर चौकात उभा राहून टुबुक बापूंशी अदबीने बोलत होता.


लै देखनी है बघा गावडी,अक्षी चित्रातल्यावाणी. मालकाला पैशाची नड हाय.म्हनून जनावर इक राह्यलाय.हा चांगला मोका हाय भाऊसायब... म्हनत आसाल त आत्ताच घिऊन येतो.एकदा बघून घ्या,मंग ठरवा."


बापूंनी ठाम नकार दिला नाही हे पाहून टुबुक त्यांची संमती अर्धीनिम्मी गृहीत धरून दुडकतच वाड्याबाहेर पडला. तो बाहेर पडताच 'टुबुक गाय आणायला गेला', ही बातमी बापूंनी माईंना आणि यशाने मंदा-मुक्ताला दिली.अर्ध्या तासाने टुबुक गायीचं दावं हातात धरून तिला घेऊन आला.गाय खरोखरच सुंदर होती.

अटकर बांध्याची,मध्यम उंचीची आणि पांढऱ्या स्वच्छ रंगाची. तिची शिगंही छोटी पण रेखीव होती आणि महत्त्वाचं म्हणजे तिच्या कपाळावर पिंपळपानाचं शुभचिन्ह होतं! बघताच गाय सर्वांनाच आवडली.आधी माई आणखी एक गाय सांभाळायला नाखूश होत्या.कारण त्यांचं काम आणखी वाढणार होतं पण गायीला पाहताच त्यांचा विरोध मावळला.टुबुकने तिचं नाव पार्वती असल्याचं सांगितलं.यशाला तर ती चांदोबा मासिकातल्या चित्रांत दाखवतात तशी देखणी वाटली.


टुबुक म्हणाला,"भाऊसायब,गाय एकदम गरीब हाय बरं का ! पोरांना तिच्या खालून जायला सांगा,ती कायबी करनार न्हाई.

फकस्त एक डाव कुंपनावरून उडी मारताना तिच्या सडाला लागलं होतं तवापासून पान्हा फुटल्यावर आपोआप दूध टपकायला लागतं."


टुबुकच्या सांगण्यावरून मंदा-मुक्ता दोघीही मांडवाखालून जावं तसं तिच्या खालून गेल्या.ती शांतच उभी होती.एकदा तर यशाने आगाऊपणा करून तिच्या खालीच आडवं पडून सडाला काही जखम दिसते का ते सड ओढून पाहिलं.त्यावेळी तिने हलकेच पाय उचलला. पार्वती वाड्यावर आली त्यावेळी ती गाभण होती. त्यामुळे माईंनी तिची काळजी बाळंतपणाला माहेरी आलेल्या लेकीसारखी घेतली.


थोड्याच दिवसांत पार्वती गोठ्यात रुळली.मुख्य म्हणजे तिचे त्या तिरसट लक्ष्मीशी चांगले सूर जुळले.अर्थात पार्वती इतकी गुणी होती की,तिच्याशी कुणीही वाकुडेपणा केला नसता.माईंच्या सकाळच्या गोठ्यातल्या गप्पांना आता आणखी एक नवीन सखी आणि नवीन विषय मिळाला.पार्वतीच्या पोटावरून हात फिरवत लेकीशी बोलावं तसं माई बोलत,"पार्वती,बाई, तू काही चिंता करू नकोस.काहीही होऊ दे.आपल्या घरात मुलगा आणि मुलगी असा फरक अजिबात करत नाहीत.आणि हो,गोठ्यात लक्ष्मीचा नंद्या आहेच ना. त्यामुळे तुला कालवड झाली तरी चालेल !"


लक्ष्मीप्रमाणेच ह्या पार्वतीला माईंचं बोलणं कितपत कळत होतं कोण जाणे.मात्र माईंच्या गोड आवाजातलं बोलणं आणि माईंनी आपला मऊ हात तिच्या अंगावरून फिरवणं तिला नक्कीच छान वाटत असणार. कारण ती माईचा हात,अंग आपल्या खरखरीत जिभेने चाटे.माईंच्या अंगाशी आपलं अंग घासे.लक्ष्मीपण पार्वतीशी समजुतीने वागे.नंद्याला पार्वतीच्या जवळ उड्या मारू देत नसे.


एका रात्री माईंनी यशाला उठवलं."यशा बाळा, गवळीवाड्यात जाऊन दामूला जरा बोलावून आण. बापूच गेले असते पण इथे माझ्या मदतीला कुणी असलेलं बरं.दामूला म्हणावं,

पार्वती टेकीला आलीय. लवकर ये.आणि हो,दामूबरोबर चोंबड्यासारखा तूही मागे गोठ्यात येऊ नकोस.

बायामाणसांना लाज वाटते. त्या अंग आखडून घेतात." दामू आला आणि तासाभरात पार्वती मोकळी झाली.पार्वतीला कालवड झाली होती.गोऱ्याधप्प पार्वतीची पोर मात्र काळसर करड्या रंगाची होती. पार्वतीच्या आजूबाजूचं आवरून झाल्यावर माईंनी यशाला गोठ्यात बोलावलं.यशा आल्यावर माई त्याला म्हणाल्या,


"यशा,रात्रीच्या अंधारात गवळीवाड्यात जाऊन दामूला वेळेवारी बोलावून आणलंस हो.आता कालवडीचं नाव काय ठेवायचं ते तुम्ही तिघं मिळून ठरवा."


यशा चटकन् उत्तरला,"नाव तर आम्ही आधीच ठरवून टाकलंय.कालवड झाली तर तिचं नाव सोमी ठेवायचं म्हणून."


बापू म्हणाले,"मंजूर ! झालं तिचं बारसं.देवा,आता दामू आहे तोवर पार्वतीसाठी बाजरी शिजवायला लावा.गूळ घालून तिला खायला घालायला सांगितलंय."


"आणि हो,उद्यापासून दुधासाठी तिला काथबोळपण सुरू करायला हवा. बरं,आता मी चहा टाकते. बाळंतपण करून दामूपण दमला असेल." माईंनी म्हटलं.


अशा रीतीने वाड्यावर लक्ष्मी,पार्वती,नंद्या आणि सोमी असं एक कुटुंब तयार झालं.लक्ष्मी-पार्वतीमुळे दूधदुभतं मुबलक झालं,गोठा समृद्ध झाल्याने वाड्याच्या मागच्या भागालासुद्धा पूर्णत्व आलं.


हौशा-नाच्याच्या खरेदीच्या वेळला मात्र माईंनी आपल्या स्वभावाच्या विरुद्ध प्रचंड विरोध बापूंना केला. 'बैलजोडीची आपल्याला काय गरज आहे,जरूर पडते त्यावेळेला सुखदेव गावातून कुणाचे तरी बैल आणून वेळ निभावून नेतो ना? उगाच खायला काळ नि भुईला भार.तुमचे रिटायरमेंटचे पैसे मिळाले आहेत ते तुमच्या खिशात उड्या मारताहेत,ते संपवल्याशिवाय तुम्हाला काही चैन पडणार नाही.मुलं लहान आहेत.अडीअडचणीसाठी पोष्टात ठेवून द्या.तेवढेच महिन्याच्या किरकोळ खर्चाला चार पैसे मिळतील...' वगैरे.


पण ऐकतील ते बापू कसले! त्यांच्या मनात एखादी गोष्ट आली की,ती केल्याशिवाय त्यांना चैनच पडत नसे शिवाय आपण ती गोष्ट का करतो आहोत,ह्याची सयुक्तिक कारणं त्यांच्याकडे तयार असत.


"देवा,तुम्हाला समजत नाही.सुखदेवचा असा तिरपगडा स्वभाव.सगळा गाव त्याच्या विरुद्ध ! दरवेळेला बैलांसाठी गावातल्या कुणाची तरी मनधरणी करावी लागते.शिवाय जमीन काही आपण विकत घेतली नाही. आपल्या घराण्याला इनाम मिळालेली आहे.तिच्या मशागतीसाठी आपण थोडाफार खर्च करायला नको काय? आणखी एक म्हणजे,शेताची कामं नसतील तेव्हा बैलगाडी इथेच आपल्या वाड्यावर राहील.कुठे जायला-यायला उपयोगी पडेल."


नेहमीप्रमाणे माईनी अखेर बापूंच्या प्रस्तावाला होकार दिला.

हौशा-नाच्याची जोडी घरी आली.दोघेही धप्प पांढरे होते.पण तेवढं सोडलं तर जोडी म्हणून ते एकमेकांना फारसे साजेसे नव्हते.

हौशा छोट्या शिंगांचा, अटकर बांध्याचा आणि मध्यम उंचीचा होता.नाच्या मात्र मोठ्या शिंगांचा नि उंचापुरा होता.उंचीला तो हौशापेक्षा फूटभर तरी उंच होता.हौशा त्याच्या जोडीने पळायचा. ताकदीलाही चांगला होता.पण नाच्याची गोष्टच वेगळी. त्याची ताकददेखील अफाट होती.


एकदा बाबू तांगेवाल्याला अनकाईच्या यात्रेला जायची इच्छा झाली.तो बापूंशी बोलता बोलता म्हणाला,


"माझा एक घोडा थोडा आजारी आहे.भुऱ्याबरोबर नाच्याची जोड देऊन तांगा काढू या का? तुम्ही सगळे आणि मी.दहाबारा मैलांचं तर अंतर."


बापू म्हणाले "चला,बघू या आमचा नाच्या तुझ्या भुऱ्याला किती पुरा पडतो ते!"


बाबूच्या भुऱ्याघोड्याच्या जोडीला नाच्याला तांग्याला जोडलं.

नाच्याला बहुधा हे आपल्याला चॅलेंज आहे हे समजलं असावं.

त्याने जी ऽऽऽ धावायला सुरुवात केली ती थेट अनकाईला जाऊन परत घरी येईपर्यंत! त्याने भुऱ्याच्या तोंडाला चांगलाच फेस आणला.


एकदा माईंच्या डोक्यात आलं,नवरात्रीनंतर कोटमगावला गेलो नाही.आता घरची गाडी आहे तर देवीचं दर्शन करून येऊ या.हल्ली काही दिवस घरातल्या भाऊबंदकीमुळे बापूंचाही मूड कधी कधी ठीक नसे.म्हणूनही माईंनी कोटमगावला जायची टूम काढली असावी.बापू माईंच्या इच्छेला कधीच मोडता घालत नसत.बापूंनी यशाला गाडी जोडून दिली.कासरा त्याच्या हातात देऊन रस्त्याच्या कडेकडेने गाडी घ्यायला सांगितली.गाडी कोटमगावच्या रस्त्याला लागली. रस्त्यात प्रकाशचा भत्ता आणि महेशकडची जिलेबी बरोबर घेतली.शेटजीचा बाग ओलांडला आणि यशाच्या निरीक्षणात एक गोष्ट आली.हौशापेक्षा नाच्या फूटभर उंच असल्याने गाडीचं जू त्याच्या मानेवर जास्तच टेकलं जातंय.

हौशाला कमी उंचीचा फायदा मिळत होता. गाडीचं जास्तीत जास्त वजन नाच्यालाच खेचावं लागत होतं.यशाने ही गोष्ट बापूंना सांगितली.इतक्या वेळ गप्पा मारणारे बापू अचानक स्तब्ध झाले.कुठेतरी शून्यात बघत ते म्हणाले,


"यशा,मोठं असण्याचा हा परिणाम आहे बाबा! मोठ्यावर जास्त वजन पडतं.गाडीचा जास्त बोजा त्यांना ओढावा लागतो आणि लोकांनापण हळूहळू मोठ्याकडून तशीच अपेक्षा वाटत राहते."


बापूंच्या बोलण्याचा रोख माईंच्या लक्षात आला. त्या समजुतीच्या सुरात म्हणाल्या,"मोठ्याची ताकद जास्त. त्याला मिळणारा मानही मोठा.तसंच त्याच्यावरचा संसाराचा भारही जास्त.छोट्यांना बरोबर घेऊन चालण्याने गाडा व्यवस्थित चालतो अन् संसाराचा तोलही सांभाळला जातो."


बापू खळखळून हसत म्हणाले,"सरकार,मी नेहमी म्हणतो,तेच खरं आहे.तुम्ही वकील व्हायला पाहिजे होतं ! तुमचं म्हणणं तुम्ही मॅजिस्ट्रेटला बरोबर पटवून दिलं असतं."


आकाशातलं मळभ बाजूला झालं आणि मंडळी हसतखेळत देवीच्या मंदिराकडे दौडू लागली.


शेतीच्या कामानुसार हौशा,नाच्या कधी वाड्यावर तर कधी शेतावर असत.पोळा जवळ आला तेव्हा ते दोघेही शेतावरच होते.सुखदेवने बापूंना सांगितलं की, 'पोळ्याच्या मिरवणुकीत धाकट्या धन्यांना पाठवून द्या.' तेव्हापासून यशा पोळा कधी येईल,म्हणून दिवस मोजत होता.पोळ्याचा आदला दिवस होता.वर्गात शेवटचा तास चालू होता.मास्तर घरून करून आणायचा अभ्यास लिहून देत होते.पण कुणाचंच त्यांच्याकडे लक्ष नव्हतं. प्रत्येक जण उद्याचा पोळा कसा साजरा करायचा, ह्याबद्दल शेजारच्या मित्राशी बोलत होता.घंटा वाजली अन् यशा घराकडे झिंगाट पळत सुटला.


दुडक्या चालीने घराकडे पळताना यशाच्या डोक्यात काल रात्रीचं बापूंचं बोलणं येत होतं.पोळ्याच्या निमित्ताने शहरात कॉलेजमध्ये शिकणारा यशाचा अशोकभाऊ त्याच्या मित्रांना पोळा दाखवायला घेऊन आला होता.बापू त्याला दुसऱ्या दिवशी बाजारातून पोळ्यासाठी आणायच्या सामानाची यादी सांगत होते. कवड्यांच्या माळा,शिंगांसाठी पितळी शेंब्या,गळ्यात बांधायला घंटा आणि अंगावर छापे मारायला हिंगुळ. आपण लवकर घरी पोहचलो नाही तर दादा मित्रांबरोबर खरेदीला निघून जाईल ह्या विचाराने यशाने आपला वेग वाढवला.


दुसऱ्या दिवशी सकाळी दादा आणि त्याच्या मित्रांबरोबर गावी शेतावर जाण्यासाठी एसटी स्टँडवर जायला यशा निघाला तेव्हा यशाला पोटाशी धरत माईंनी बजावलं, "मागेच राहा.

फार पुढे गेलास तर बैलांच्या मध्ये सापडशील आणि तुम्ही रे - तुमच्याच नादात राहू नका. लहान पोर आहे बरोबर ह्याचं भान ठेवा!"


दादाने होकारार्थी मान डोलवली.सहा मैलांवरच्या गावातल्या शेतावर पोहचल्यावर खोपटात सामान टाकून सारेच उधळले.

हौशा-नाच्याच्या जोडीपैकी दादाने नाच्या स्वतःकडे घेत हौशाचा कासरा यशाच्या हातात दिला. सुखदेवचा मुलगा श्रीपती ह्याच्या मागोमाग बांधावरून चालताना सगळेच खुशीत आले होते.

नुकत्याच पडलेल्या पावसाने सगळा आसमंत हिरवागार झाला होता.जनावरांनापण आज त्यांचा खास दिवस आहे हे जणू कळत होतं.मधूनच डुरक्या मारत जमीन पायांनी उकरत तेही मोठ्या डौलाने चालले होते.डोहाच्या शेजारी बैलांना पाण्यात उतरवून धुण्याची धूम सुरू झाली होती.यशाने खिशातून काथ्याची गुंडी काढली आणि तिने तो हौशाला घासू लागला.


बैल स्वच्छ धुऊन झाल्यावर खळ्यात दादा आणि त्याचे मित्र,

नाच्या आणि इतर बैलांना सजवत होते.हौशाचा ताबा फक्त यशाकडे होता.ओल्या हिंगुळात हात बुडवून हौशाच्या अंगावर हाताचे छापे मारताना हौशाचं अंग दरवेळी शहारत होतं.ते पाहून यशालाही आनंदाचं भरतं येत होतं.शेंब्या लावून,कवड्यांच्या माळा घालून हौशा-नाच्याची जोडी झकास दिसत होती.


दुपारी पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून (आणि बैलांची पूजा करून) संध्याकाळी सगळं गाव सतीच्या माळावर जमलं.भुरभुरत्या पावसात सगळीच जनावरं,खिल्लारं ओढ घेत होती.डुरक्या देत जमीन उकरत होती. एकमेकांना दुशा देत होती.रेस सुरू झाली की, वेशीपर्यंत दौडत जायचं अन् वेशीला बांधलेली मोठी माळ तोडायची.त्या माळेचा तुकडा मिळवणं मानाचं समजलं जायचं.ही सगळी माहिती आपल्या मित्रांना देता देताच दादा यशाला म्हणाला,


"यशा,ह्या धबडग्यात शिरू नकोस.हौशाचा कासरा ओढून धर आणि एकदम भागे राहा बरं.मी देईन तुला माळेचा तुकडा !"


यशाने नाराजीने मान हलवली.


आजूबाजूच्या गर्दीचा गोंगाट वाढला.शेमले उडू लागले. धुळीने वातावरण कुंद झालं.बैलांनी डुरक्या मारून गोंगाटात मोठीच भर घातली.पंचांच्या इशाऱ्याबरोबर गुरवांनी शिंग फुंकलं.एकच धूम झाली.प्रत्येक जण बैलाबरोबर वेशीकडे धावू लागला.हौशानेही त्याच्या छोट्या मालकाला घेऊन गर्दीत मुसंडी मारली.दादाच्या सूचना विसरून यशाही स्पर्धेत उतरला.वेस पार करून नाच्याच्या शेजारी उभ्या असलेल्या दादाने पाहिलं तर हातात माळेचा तुकडा घेऊन यशा बेभान नाचत होता. हौशाला थोपटत होता.त्याचे पापे घेत होता.दादाने कौतुकाने यशाला जवळ घेतलं आणि ठिकठिकाणी खरचटलेल्या यशाच्या डोक्यावर थोपटत अभिमानाने आपल्या मित्रांकडे पाहिलं.


… समाप्त..!!

3/20/26

जितराबं / jitrab

बापू म्हणाले,"सरकार,माझं बोलणं पूर्ण तरी करू द्या. लक्ष्मी नावाची गाय आपल्याकडे येऊ घातलीय.काल संध्याकाळी नेहमीप्रमाणे अंगणगाव रोडला चालायला गेलो होतो.बऱ्याच दिवसांनी केशवराव पटेल बरोबर होते.आठ फर्लांग चालत जायचं म्हणजे बऱ्याच गप्पा होतात.केशवरावांचा मोठा कारभार आहे.गोधनदेखील खूप आहे.ते म्हणत होते,ह्या वर्षी चांगल्या कुटुंबांत पाच गायी द्यायचं त्यांच्या मनात आहे.त्यांनी विचारलं, 'बापूसाहेब,एक लक्ष्मी नावाची सवत्स धेनू आपली हरकत नसेल तर आपल्याला द्यावी असं मनात आहे.' मी म्हटलं,विचार करून उद्यापर्यंत सांगतो.आज संध्याकाळी ते भेटतील तर काय सांगू त्यांना ?"


माई क्षणभर विचार करून म्हणाल्या,"सवत्स धेनू स्वतःहून येतीय.तिला करंट्यासारखं नाही कसं म्हणायचं? थोडं काम वाढेल.गवताचा खर्चही वाढेल पण तेवढाच दुधाचा खर्चही कमी होईल."


तर अशा रीतीने लक्ष्मीचा वाड्यात प्रवेश झाला.ती येण्याच्या आधी मागच्या अंगणात आड,मोरीचा चौक आणि संडास ह्यांच्या मधल्या जागेत भिंतीलगत दावणं बसवली गेली.लक्ष्मीला पाणी प्यायला म्हणून वापरात नसलेलं गंगाळं चिंच लावून घासून चांगलं चकचकीत केलं गेलं.लक्ष्मी उंच,सडसडीत,तांबड्या-पांढऱ्या रंगाची गाय होती.तिची डौलदार पण लांब शिंगं तिला छान शोभत होती.तिच्या वासराचं नाव पहिल्याच दिवशी यशाने 'नंद्या' ठेवलं.


हळूहळू लक्ष्मी वाड्यात रुळली.लक्ष्मीचं खाणंपिणं माईच बघत.घर आणि अंगण झाडण्यात आता मागचं अंगणपण वाढलं होतं.

घरातले अन् मागच्या अंगणातलं भाडेकरू असलेलं मारवाडी कुटुंब त्या भागाला गोठा म्हणू लागलं.लक्ष्मीचं दूध काढायला,

सकाळ.- संध्याकाळ दामू यायचा.घरात दूध-दुभत्याची रेलचल व्हायला लागली.आठवड्यातले निम्मे दिवस आदल्या दिवशी मुद्दाम करून ठेवलेली बाजरीची भाकरी कुस्करून त्यावर गरम दूध हा नास्ता तिन्ही मुलांना आवडू लागला.सकाळचं.चहापाणी आटोपून माई व्यंकटेश स्तोत्र म्हणता म्हणता लक्ष्मीचा गोठा आवरत. त्यांचा बराच वेळ तिथे जाई.एकीकडे झाडताना,शेण गोळा करताना किंवा लक्ष्मीच्या पुढे गवत टाकताना व्यकंटेश स्तोत्र थांबवून माईच्या लक्ष्मीशी गप्पा चालत. त्याही इतक्या प्रेमाने की,कुणी नुसतं लांबून ऐकलं तर वाटावं,एखादी प्रेमळ स्त्री तिच्या लेकीशी बोलतेय. तिच्या पाठीवरून,अंगावरून हात फिरवता फिरवता माई म्हणत,"अगं,काल रात्रीचं खाणं तसंच पडलंय.भूक नव्हती का गं? वेळेवर खाल्लं पाहिजे बाई.केवढी सुकलीयस तू. लेकुरवाळीने खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष करून कसं चालेल?"


लक्ष्मी स्वभावाने थोडी हेकट नि तापट होती.कधी कधी ती माईंच्या बोलण्याला,अंगावरून मायेने हात फिरवण्याला चांगला प्रतिसाद देई तर कधी चक्क दुर्लक्ष करी.


एकदा तिचं काय बिघडलं,कोण जाणे! तिने माईंना अशी दुशी दिली की,भितळीवर आदळून माईंना चांगलंच खरचटलं.यशा आडाचं पाणी काढून आंघोळीसाठी बंबात भरत होता.धावत येऊन त्याने माईंना उठायला मदत केली आणि पळत बाहेर जाऊन बापूंची काठी आणली.माईंना काही समजायच्या आत त्याने लक्ष्मीला दोन सणसणीत रट्टे लगावले.ते पाहून माई कळवळल्या.

यशाला ओरडून थांबवलं.नंतर समजावत म्हणाल्या,


 "अरे,मुकं जनावर ते.प्रतिकार करू शकत नाही म्हणून का मारायचं ? आणि तिने काही मुद्दाम नाही ढकललं रे. तिने मान हलवली त्याच वेळेला मी नेमकी मध्ये आले. हो की नाही ग लक्ष्मी ?"


तेवढ्यात लक्ष्मीने मान हलवली.माई म्हणाल्या,"बघ ! हो म्हणतेय."


यशा मुकाट्याने काठी ठेवायला ओसरीकडे गेला.


नाताळाची सुट्टी आठवड्यावर आली आणि बापूंच्या डोक्यात आलं,ही सुट्टी शेतावर घालवावी.माईंनी शंका काढली,


"अहो पण राह्यचं कुठे?"


बापूंचं नियोजन पक्कं असे.त्यांनी कानडेंना त्यांच्या शेतातलं घर पंधरा दिवसांसाठी रायला मागितलं. कानड्यांचं शेत बापूंच्या शेताला लागूनच होतं.शिवाय कानड्यांचं स्वतःचं असं उसाचं खूप मोठं क्षेत्र असल्याने त्यांच्या वावरातच गुऱ्हाळ लावलं होतं.ते दोन महिने चालणार होतं.मग काय! यशा-मंदा-मुक्ता खूश !


बापू म्हणाले "तुम्हा सगळ्यांची तयारी असेल तर आपण घरीच बाजरीची कणसं ताटापासून वेगळी करू, मळणीपण घरीच करू म्हणजे मजूरीचे पैसेही वाचतील. माईला घरातलं अन् स्वैपाकपाण्याचंही काम असल्याने उरलेल्या सगळ्यांनी दररोज एका पाचुंद्याचं कणीस तोडायचं."


नवीन अनुभव म्हणून सगळे आनंदाने कबूल झाले.


"बापू,पाचुंदा म्हणजे किती?" लहानग्या मुक्ताने विचारलं.


बापूंनी सांगितलं,"बाजरीची ताटं शेतातून कापली की, त्याच्या छोट्या छोट्या जुड्या एकत्र बांधतात.एकेका जुडीत सुमारे पंधरा ताटं असतात.अशा पाच जुड्यांचा एक पाचुंदा होतो."


यशाने मनातल्या मनात पंधराचा पाढा म्हटला आणि मुक्ताला म्हटलं,"म्हणजे मुक्ता,प्रत्येकाने पंचाहत्तर कणसं ताटांपासून वेगळी करायची !"


गावगोत,माधव सावरगांकर,अष्टगंध प्रकाशन


आपण कसा बरोबर हिशेब केला म्हणून त्याने शाबासकीच्या अपेक्षेने बापूंकडे पाहिलं.त्यांनीही 'बरोबर !' म्हणून मान हलवली.


एकदा जायचं म्हटल्यावर यशा-मंदा-मुक्ता ह्यांचं मनोराज्यम् सुरू झालं.माई आणि बापू न्यायच्या सामानाची लिस्ट बनवण्याच्या कामी लागले. मनोराज्यम् करता करता अचानक एक गोष्ट यशाच्या लक्षात आली.त्यामुळे तो धावतपळत ओसरीवर


माई-बापू बसले होते तिकडे आला आणि म्हणाला,


"बापू, आपण शेतावर पंधरा दिवस राहणार मग लक्ष्मी आणि नंद्याचं काय ?"


बापूंनी कौतुकाने त्याच्याकडे पाहिलं आणि ते हसून म्हणाले,

"यशवंतराव,तिथेही आपल्याला दूध लागणारच ना? तेव्हा लक्ष्मीला आणि नंद्याला आपण आपल्याबरोबरच न्यायचं.तिथे चाऱ्याचाही प्रश्न नाही. बाजरीचं पाचट आहेच शिवाय आप्पा कानड्यांच्या मळ्यात भरपूर हिरवा चारा मिळेल. लक्ष्मी आणि नंद्या पंधरा दिवसांत चांगले ताजे पडतील."


आणि मग शेतावर जाण्याचा तो दिवस उगवला.बापूंनी तातूकाकांची एक आणि आप्पा कानड्यांची एक अशा दोन बैलगाड्या मागवल्या.एका गाडीत पंधरा दिवसांसाठी माईंनी बरोबर घेतलेल्या शिध्याची गाठोडी, सगळ्यांचे कपडे असं मिळून मोठाच रमणा झाला होता.कारण भाजणी,मेतकूट,

साबुदाणा,पोहे... असे बरेच काही जिन्नस सगळ्यांनी आठवून आठवून सुचवले होते.त्याच समानाच्या गाडीत नंद्याला बांधून ठेवलं होतं. लक्ष्मीच्या गळ्यातलं चऱ्हाट त्याच गाडीच्या मागच्या बाजूच्या कडीला बांधलं.नंद्याच्या ओढीने ती चटचट पाय उचलील ही अटकळ होती.


दुसऱ्या गाडीत खाली पायऱ्यांवर जाड जाजम घातलं. शेतावरच्या मुक्कामासाठी अंथरुण-पांघरुणं लागणारच होती.तीच खाली टाकल्याने गाडीत चांगली गुबगुबीत बैठक तयार झाली होती.बापू आणि माई तिन्ही मुलांसह गाडीत बसले.एक तर दोनपैकी एक गाडी यायला उशीर झाला.गोठ्यातून मागच्या दरवाजाने बाहेर रस्त्यावर यायला लक्ष्मीने खूपच खळखळ केली.त्यामुळे गाड्या ढळायला साडेपाच वाजून गेले.चार कोसांचं अंतर तोडून रात्री आठ साडेआठपर्यंत मुक्कामी पोहचू हा निघतानाचा अंदाज होता.अर्थात थोडं इकडं तिकडं चालणार होतं.कारण रात्रीच्या जेवणासाठी माईंनी दशम्या आणि पीठ पेरून कांद्याची भाजी केली होती.


लक्ष्मीने सुरुवातीपासूनच नाठाळपणा करायला सुरुवात केली होती.ती फारच हटून बसली की,कुणीतरी गाडीतून उतरून तिला हाकलायचं,लक्ष्मीमुळे प्रवासाचा वेग खूपच मंदावला.अंधार पडू लागला.निम्मा रस्ता कसाबसा पार झाला पण आता अंधार गडद झाला होता.थंडीदेखील झोंबरी झाली होती आणि अचानक लक्ष्मीने बसकण मारली.काही केल्या ती उठेना.माई गाडीतून खाली उतरल्या.लक्ष्मीला थोपटून,आंजारून-गोंजारून त्यांनी उठवायचा प्रयत्न केला.पण लक्ष्मीचा असहकार काही संपेना.आता काय करावं,हा प्रश्न सगळ्यांच्याच पुढे पडला.


बरं,एका गाडीला अंधारात एकटं सोडणंसुद्धा शक्य नव्हतं.माईंच्या आधी बापूपण खाली उतरले होते. अंधारात आजूबाजूला पाहताना त्यांना लांबवर एकदोन मंद दिवे दिसले.त्यांनी गाडीवाल्याला विचारलं,


"श्रीपती,कुठल्या रे वस्तीचे दिवे आहेत हे?"


"धानोऱ्याची बेरडांची वस्ती हाये जी."


श्रीपतीचं उत्तर ऐकताच बापूंच्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या.रेव्हेन्यूमध्ये काम करताना त्यांना काही दिवस मॅजिस्ट्रेटची पॉवर होती,त्यावेळी धानोऱ्याच्या भिम्याची केस त्यांच्यासमोर आली होती.भीमा त्यावेळी त्या भागातला नामचीन दरोडेखोर होता.बापूंनी त्याला त्यावेळी सहानुभूतीने आणि माणुसकीने वागवलं होतं.


"श्रीपती,भिम्या आहे का रे अजून?"


"हाय की.पिकलाय आता,पन तब्येत तशीच कातळासारखी हाये.बस,तोंडावर थोड्या झुऱ्या पडल्याती." श्रीपतीने माहिती पुरवली.


त्यावर बापू म्हणाले,"श्रीपती,आम्ही इथेच थांबतो.तू गाडी सोड आणि वस्तीवर जाऊन भिम्याला सांग मी आलोय.

रस्त्यात आमच्या गायीने बसकण मारलीय."


श्रीपती बापूंच्या सांगण्याप्रमाणे निघाला.अर्ध्या तासाने श्रीपतीसोबत तीनचार जण येताना दिसले.भिम्याने आल्या आल्या बापूंच्या पाया पडून नमस्कार केला.


"देवा,आज माझं भाग्य उजाडलं.तुमचं पाय आमच्या वस्तीला लागले.इतक्या जवळ आलात.आता बिनघोर राहा.तुमची गाडी घेऊन तुम्ही म्होरं ढळा.मी येतो जनावराला घिऊन.शिरपती म्हनत व्हता कानड्याच्या वावरात पंश्वा दिस मुक्काम हाये म्हूनत पंध्रा दिस मी खळ्यात वस्तीला येईल.बाहेरच आळं करून पडल, वहिनीसाहेब आन पोरं बरोबर हायेत.काही दगा फटका होवाया नगं."


म्हाताऱ्या भिमाकडे बघत बापू मुद्दाम म्हणाले,"भिम्या, चारपाच जवान पोरं दांडकं घेऊन आले तर एकटा काय करशील रे?"


पांढऱ्या झालेल्या मिशांच्या झुबक्यांवर मूठ फिरवत भिम्या म्हणाला,"देवा,भिमा राखणीला हाय हे समजल्यावर कानड्याचं शिवारच काय,पण पंचक्रोशीतही कुनी फिरकायचं न्हाई."


बापू आणि माईंची गाडी निघेपर्यंत लक्ष्मीच्या पोटाखाली फळकुट घालून तिला उभी करण्याचे प्रयत्न सुरू झाले होते.


दुसऱ्या दिवशी माई सकाळी घराच्या बाहेर अंगणात आल्या तेव्हा लक्ष्मी नंद्याला चाटत उभी असलेली त्यांना दिसली.भिम्या 'रात्री परत येईन' असा निरोप ठेवून पहाटे अंधारातच आपल्या वस्तीवर गेला होता.पुढचे पंधरा दिवस मुलं पाखरांसारखी मुक्त फिरत होती. सकाळचा नास्ता झाला की,प्रत्येक जण एक पाचुंदा बाजरीची ताटं घेऊन विळ्याने कणसं वेगळी करत, हसतखेळत चुरशीने काम करत होता.अकराच्या सुमारास काम संपायचं.दोनशे फुटांवरच गुऱ्हाळाची काहील ठेवली होती.गूळ बनवतानाच्या आणि जाळाची भट्टी पेटती ठेवण्याच्या आवाजाने वातावरणात जाग होती.प्रत्येक वेळेला काहील उतरण्याच्या सुमारास तिन्ही मुलं उसाची टिपरी घेऊन वाट पाहत.काहील उतरल्यावर थोड्याच वेळात गुळावरती साय येई. त्याच्यावरून हातातली टिपर गोल गोल फिरवून ती साय नंतर थोडी थंड झाल्यावर खाण्यातला अवर्णनीय आनंद लुटताना त्यांना परमोच्च समाधान मिळे.


एक दिवस एका गुळ्याने एक एकदम वेगळाच पदार्थ सांगितला.गरम गुळात मुरमुरे-शेंगदाणे घालून केलेले लाडू चांगले तर लागतातच पण त्याच्या सांगण्यावरून बापूंनी त्याला खोबऱ्याच्या सातआठ वाट्या आणि स्टीलची तार आणून दिली.त्याने त्या वाट्या त्या तारेतून ओवून उसाच्या रसाबरोबर काहिलीत सोडल्या.उसाच्या रसाबरोबर त्या वाट्या काहिलीत गूळ तयार होईपर्यंत ठेवल्या.काहील उतरायच्या आधी त्या बाहेर काढल्या. त्याची चव मुलांनाच काय पण माई-बापूंनाही अवीट आणि अविस्मरणीय वाटली.


शेतावर राह्यला जाऊन आठ दिवस झाले होते.एकदा कणसं तोडत बसलेल्या यशाला बापूंनी लक्ष्मीला लिंबाच्या सावलीत बांधायला सांगितलं.यशा फुशारकीत उठला.लक्ष्मीचं दावं सोडून तिला तो लिंबाकडे घेऊन जायला लागला.आजूबाजूचं हिरवंगार गवत पाहून लक्ष्मी तिकडे जाऊ बघत होती आणि त्यामुळे यशा तिकडे ओढला जात होता.यशा जोर लावून तिला लिंबाकडे खेचत होता.शेवटी लक्ष्मीने यशाला डोक्याने उचललं आणि बाजूला फेकलं.यशा सातआठ फुटांवर फेकला गेला.माई, बापू, गुऱ्हाळात काम करणारी माणसं... सगळी धावली.ती येऊन पोहचेस्तोवर यशा अंगाला लागलेली माती झटकत उभासुद्धा राहिला. जवळ कणसं तोडायला,मदत करायला बसलेला श्रीपती म्हणाला,


"जनावर लै हुशार ! छोट्या मालकांना असं कोलवलं की,त्यांना शिंग लागू दिलं नै का इजा होऊ दिली नै." 


राहिलेला भाग पुढील लेखामध्ये..