* विजय गायकवाड | Vijay Gaikawad

live

नमस्कार आपले स्वागत आहे. मी पुस्तके आणि मित्रांवर पैसे खर्च करतो,माझ्याकडे दगड आणि विटांवर खर्च करण्यासाठी पैसे नाहीत.- रस्किन बाँड.ही थोर माणसं व त्यांचे विचार मला पुस्तकात भेटलीत.ती भेटली आणि त्यांनी सांगितले कि, प्रत्येक दिवशी असं काही तरी करा की,ते तुम्हाला अधिक सुंदर उद्याच्या दिशेने खूप लांबवर घेऊन जाईल."- डोग फायरबाऊ.' सर्वियन कादंबरीकार मिलोराद पावीच यांचे एक वाक्य आहे ते म्हणतात - जोवर जगात पुस्तक वाचणाऱ्या वाचकांची संख्या बंदूकधारी सैनिका पेक्षा अधिक आहे तोवर काळजीच काहीच कारण नाही.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात.पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये.म्हणून अविरतपणे प्रयत्न करणारे मार्गदर्शक, मित्र धावून येतात.प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,डॉ.दीपक शेटे,आ.भरत बुटाले,प्रा.सर्जेराव राऊत,सुभाष ढगे,अनिल फारणे,डॉ.सुधीर सरवदे ,विश्वास खाडे, विनायक पाटील,संजय कुंभार,सतीश खाडे,मनोहर सुर्वे,गणेश खंदारे,तात्या गाडेकर, दादासाहेब गाडेकर, दादासाहेब ताजणे, पुस्तकातील घटना प्रसंग सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील यांनी केलेले आहे. मला लिहिण्याची प्रेरणा देणारी पुस्तके,लेखक,प्रकाशक,मित्र ही जगावेगळी माणसं माझ्या जीवनातील महत्वाचा टप्पा आहेत.... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ.मेघा गायकवाड, चिरंजीव मयान,माझ्या धावण्यातील गुरुवर्य नामदेव बरुरे,लुल्ला शेख मोठी ताई ,लहान ताई जयश्री शिंदे या सर्वांचेच मनापासून आभार व धन्यवाद मॅट्रिक फेल विजय गायकवाड

6/2/26

प्रेम - एक देणगी / Love is a gift

प्रेम हा असा खजिना आहे की त्यासाठी आपल्याला काही देता येत नाही.तो देत राहण्यानेच खजिना खजिना रहातो.

मी जेसन स्टीव्हन्सच्या येण्याची वा वाट बघत होतो, तेव्हा माझ्या संमिश्र भावना होत्या हे मला कबूल केलंच पाहिजे.वर्षभर चाललेल्या या आमच्या शोधयात्रेत मागच्या महिन्यात जो आमचा सहप्रवास झाला,तो म्हणजे एक सुरूवात होती,हे मला माहीत होतं.जेसननं जी प्रगती केली होती,त्यामुळे मी हर्षभरित झालो होतो,आणि त्याच्या भविष्याबद्दल मला उत्साह आणि खात्री वाटत होती.कठीण पण अर्थपूर्ण प्रवास संपल्यावर येतो तो रितेपणाही मला जाणवू लागला.

मी आपला आयुष्यभराचा जिवलग रेड स्टीव्हन्स गमावून बसतोय की काय अशी एक प्रकारे माझी भावना झाली,कारण आता या दर महिन्याच्या सभेची वाट मला बघायला लागणार नव्हती.दुसऱ्या प्रकारे असंही झालं होती की जेसनबरोबर त्याच्या या रूपांतरातून जातांना असं घडलं की रेड स्टीव्हन्समधला उत्तम भाग कायम माझ्या सोबत असणार होता.

अंतर्गत फोनवरून मिस् हेस्टिंग्जनं,जेसन स्टीव्हन्स आला असल्याचं सांगितलं.त्या दोघांना मी कॉन्फरन्स रूममध्ये भेटलो,आणि माझी खात्री आहे की माझ्यासारख्याच त्याच्याही मनात संमिश्र भावना होत्या.

मिस् हेस्टिंग्जनं रेड स्टीव्हन्सच्या मृत्युपत्रासोबत तळघरात ठेवलेली व्हिडिओ टेप बाहेर काढली.हा खोका आमच्या कपाटात होता.मिस् हेस्टिंग्जचं हे नित्यकर्म आमच्या परिचयाचं झालं होतं.आमच्या कॉन्फरन्स रूमच्या टोकाला असलेल्या व्हिडिओ प्लेअरमध्ये तिनं ती ठेवली.

सर्वोत्तम देणगी,जिम स्टोव्हॅल,स्वाधारित कलासामग्री,डॉन बिलिंग्ज,अनुवाद - दिशा केळकरEMBASSY BOOK DISTRIBUTORS

मोठ्या पडद्यावर रेड स्टीव्हन्सची छबी साकारली.मला तो चांगला माहीत असल्यामुळे मी खात्रीने सांगतो की,आमच्यासारख्याच रेडच्याही भावना झाल्या होत्या.

रेडनं सुरूवात केली."जेसन,मला तुझं अभिनंदन करायचं आहे.तुझ्यासाठी मी योजलेल्या सर्वोत्तम देणगीच्या अखेरच्या टप्प्यापर्यंत तू पोचलास.मागच्या महिन्यात एका दिवसाची देणगी हा घडा होता.त्यात जी शिकण्याची क्रिया सामावलेली होती,त्यातून तू खूप छान पार पडलास,मला तुझा अभिमान वाटतो.तू तुझ्या अखेरच्या दिवसासाठी काय योजना केलीस,ते मला माहित नाही.पण ते मिस्टर हॅमिल्टनला पसंत पडलं असावं.मला वाटतं,तू बहुधा माझ्याप्रमाणे साध्या आणि सरळ गोष्टीच त्या दिवसासाठी योजल्या असशील.

"आपण जसं जगायला हवं,तसं जर जगत राहिलो,तर प्रत्येक गोष्ट अशाच क्रमाक्रमाने होत रहाते,की आपल्या आयुष्याचा शेवटचा दिवस हा इतर कोणत्याही दिवसाप्रमाणेच असतो.नेहमी लक्षात ठेव की दीर्घ आयुष्याची ग्वाही आपल्याला कोणालाच नसते, आपल्याला फक्त आजची ग्वाही असते,दुसऱ्या कशाचीही नाही.

"मला असंही वाटतं की,जरा लक्ष दिलंस तर तुला कळेल की आयुष्याच्या शेवटच्या दिवसासाठी काही योजून ठेवण्यासारखं काहीच नसतं,ते आज किंवा उद्यापण करण्यासारखं असतं.कसं कोण जाणे,पण मला वाटतं की आयुष्यातल्या दुःखद गोष्टी या मोठ्या अपयशांमुळे नाही,तर चुकलेले छोटे छोटे आनंद आणि न मिळालेले सहानुभूतिचे आविष्कार यातून बनतात."

रेड स्टीव्हन्स थांबला.त्याच्या आणि आम्हा सर्वांच्या भावना त्या अंधाऱ्या खोलीतही मला जाणवत होत्या.त्यानं बोलण चालू ठेवलं,"जेसन,या शेवटच्या महिन्यात मी तुला जी सर्वोत्तम देणगी देत आहे त्याच्या एका भागाची मी तुला ओळख करून देणार आहे.या भागात इतर सर्व देणग्यांचा समावेश होतोच,पण त्याखेरीज तू आपल्या जीवनात जे जे करशील, मिळवशील किंवा माहीत करून घेशील त्याचाही समावेश होतो.हा भाग म्हणजे प्रेम एक देणगी.

" जीवनात जे जे चांगलं,आदरणीय हवं हवंस वाटणारं असतं,त्याचा पाया प्रेम हा असतो.जे जे वाईट किंवा दुःखदायक असतं,त्याचं कारण प्रेमाचा त्याच्या जगण्यात पूर्ण अभाव हे असतं.”

आपल्या समाजात प्रेम हा शब्द चुकीच्या अर्थाने किंवा अती सढळपणाने वापरला जाणारा शब्द आहे.कित्येक गैरमहत्त्वाच्या छोट्या छोट्या गोष्टी आणि छोटे छोटे उपक्रम यांनाही तो लावतात.पण प्रेम-एक देणगी याविषयी मी बोलतो ते प्रेम म्हणजे एक स्वाभाविक चांगुलपणा असतो.गाभ्याशी प्रेम असतं तेव्हा हा चांगुलपणा त्याचा एक भाग असतो.

"या वर्षभरात ज्या ज्या इतर गोष्टींचा तू अनुभव घेतलास,त्या प्रत्येक गोष्टीत प्रेमाचा अंतर्भाव होता. आता येत्या तीस दिवसांत या गोष्टींमध्ये प्रेमाचा अंतर्भाव कसा होता,याचा माग तू घ्यायचा आहेस,मी ही तुझ्याकडून अपेक्षा करतो.तुला जे सापडलं,त्याची यादी करून तू मिस्टर हॅमिल्टनला सादर करायचीस.

"नीट लक्षात ठेव की तुझी वर्तणूक आणि तुझं काम यांची अजूनही तपासणी होते आहे.”

जर अगदी या बाराव्या महिन्यातही कसोटीस उतरला नाहीस तर तुला मी योजलेली सगळीच्या सगळी सर्वोत्तम देणगी मिळणार नाही,माझी सुचना तुला घाबरवण्यासाठी नाही.तुझ्यापुढे व्यक्त करता येईल अशी सर्वोच्च दर्जाची ती माझी प्रेमभावना आहे.त्या दर्जाप्रत मला तुला न्यायचे आहे."

रेड स्टीव्हन्सची प्रतिमा लोप पावली.पुन्हा एकदा पडदा रिक्त झाला.

काही मिनिटं जेसन स्तब्ध बसून होता.मला माहित होतं, की तो गहन विचारांमध्ये बुडलेला होता.शेवटी आम्ही सर्वजण उठलो,आणि शांतपणे कॉन्फरन्स रूममधून बाहेर पडलो.जणू काही रेड स्टीव्हन्सला श्रद्धांजली वहायला आम्ही जमलो होतो.माझ्या खूप जुन्या आणि खूप प्रिय असलेल्या मित्राला ही योग्यच प्रशंसा होती.

महिन्याच्या शेवटच्या दिवशी मिस् हेस्टिंग्ज माझ्या कार्यालयात जेसनला पुढे घालून आली.ती दोघं नेहमीच्या जागी बसली,आणि आम्ही शुभेच्छांची देवघेव केली.मी छातीठोकपणे सांगतो की,जेसन मनात खूपकाही वागवत असला पाहिजे.

जेसननं बोलायला सुरूवात केली,"मिस्टर हॅमिल्टन आणि मिस् हेस्टिंग्ज,गेल्या वर्षभराचा उपक्रम माझ्यासाठी काय घेऊन आला हे सांगायला माझ्याजवळ शब्दच नाहीत.एक वर्षापूर्वी मी जो होतो तो माणूस मी अगदी नाही.मी मानतो की,बऱ्याच अर्थी आज माझा वाढदिवस आहे.तुम्ही दोघं त्याचा एक भाग झाल्याबद्दल मला तुमचे आभार मानायचे आहेत."

माझ्या लक्षात आलं की जेसनचे डोळे पाणावले होते, आणि त्याच वेळी मिस् हेस्टिंग्जच्या अ‍ॅलर्जीनं उचल खाल्ली होती.माझाही गळा भरून आला,हे मी कबूल करतो.जेसननं खोल श्वास घेतला आणि त्याचा अहवाल सुरू केला.

"या वर्षाच्या पहिल्या महिन्यात,मला राग आला होता, आणि कुटुंबातल्या प्रत्येकाला जसा वाटा मिळाला तसा वाटा मिळाला नसल्यामुळे मनानं बंड केलं होतं.एका अख्ख्या वर्षाचा तेव्हा मी तो चक्रम बेत समजत होतो. त्याबद्दल मला कळल्यावर तर मी फारच वैतागलो होतो. मग मी टेक्ससला गस् कॉल्डवेलकडे काम एक देणगी कशी असते ते शिकायला गेलो.

"जेव्हा गस् कॉल्डवेलने मला खड्डे खणून कुंपण करायची आज्ञा केली,तेव्हा प्रेम या गोष्टीशी मी अगदी अपरिचित होतो.पण मागे वळून पाहिलं की कळतंय, की गस् कॉल्डवेलच्या मनात रेड आजोबांबद्दल गाढ प्रेम होतं आणि ते त्यांनी माझ्यापर्यंत पोचवलं.रेड आजोबांनी काम-एक देणगी हा जो धडा माझ्यासाठी योजला होता तो मी नीट शिकावा म्हणून त्यांनी भरभरून प्रेम केलं माझ्यावर,काम नीट नेटकं करण्यानं एक प्रकारचं प्रेम मिळतं हे पण मी शिकलो.दिवसभर श्रम केल्यावर तुम्ही थांबता आणि सरळ बळकट कुंपणावरून,जे कुंपण तुम्ही स्वतःबांधलंय त्यावरून सूर्य मावळतांना बघता,तेव्हा तुम्हाला जगाचा व्यवहार सुरळीत चालल्याची जाणीव होते.

" पैसा- एक देणगी हा धडा मी ज्या महिन्यात शिकलो तेव्हा मी शिकलो की,पैशावर प्रेम करण्यानं एका पोकळ,अर्थहीन जीण्याकडे आपण जातो.पण आपण जेव्हा लोकांवर प्रेम करायला शिकतो,आणि पैशाचा साधन म्हणून वापर करतो,तेव्हा सर्व गोष्टी यथार्थ दृष्टीने पाहिल्या आहेत असं वाटतं.

" मित्र-एक देणगी हा धडा मी ज्या महिन्यात शिकलो, तेव्हा आपण इतरांवर कशा रीतीने प्रेम दाखवू शकतो हे मी प्रथमच शिकलो.आपण जेव्हा फक्त स्वतःबद्दलच चिंता करतो तेव्हा आपण नेहमी हिरमुसलेले राहतो. पण जेव्हा आपण इतरांचा आणि त्यांच्या भल्याचा विचार आधी करतो,तेव्हा आपलं आणि त्यांचही भलं होतं.

" शिकणं - एक देणगी असल्याचं शिकतांना मला असा शोध लागला की,ज्या लोकांजवळ पैसे नाहीत,पण शिकण्याची ओढ आणि शिक्षणावर प्रेम आहे ते लोक सधन असतात.हे ज्ञानावरचं प्रेम माझ्या जीवनांत झिरपलं,आणि मी किती स्वकेंद्रित होतो की ज्यामुळे, मी परंपरेने वर्षानुवर्षे आपल्यापर्यंत पोचलेलं शहाणपण दुर्लक्षित ठेवलं,आणि स्वतःला नाशाप्रत ढकलत राहिलो,हे जाणवलं.

" प्रश्न - एक देणगी यातून मी असं शिकलो की, प्रश्न,अडथळे म्हणजे आपल्यासमोर येणारी आव्हानं,याखेरीज दुसरं काहीच नसतं.या वर्षापूर्वी प्रश्नांना मी काहीतरी पूर्णपणे वाईट गोष्ट असं मानायचो.एक ब्याद समजून तिची वासलात लावायचो,किंवा त्याहूनही वरकडी म्हणजे त्याच्याकडे पूर्णतःपाठ फिरवायचो.पण जेव्हा आपण आपल्या प्रश्नांकडे जिव्हाळ्याने बघतो, तेव्हा असं लक्षात येतं की,या दुनियेत एक सुंदर आखणी आहे.प्रश्न तुमच्यासमोर येतो,त्याचा उद्देश, तुम्हाला काही धडा शिकवावा असा असतो,आणि तुम्ही अधिक चांगली व्यक्ती बनावं,असा असतो.

" कुटुंब - एक देणगी या धड्यानं मला असं शिकवलं की जगण्यावर प्रेम करायचं असलं तर तुम्ही जगण्यातली मौज लुटायला हवी.आपण जेव्हा चांगल्याला आणि वाईटालाही हसू लागतो, तेव्हाच जीवन आपल्याला जे प्रेम देतं ते जाणवतं.

" स्वप्न - एक देणगी या विषयात मी जसा जसा खोल उतरायला लागलो,तसं मला समजलं की आपल्या भोवतालचं जे जे असतं,त्यावर प्रेम करावं, म्हणून आपल्याला जीवन दिलं गेलंय.आपल्या अंतर्यामी जे वाटतं,त्याचा बाह्य आविष्कार म्हणजे आपला कल,आपली स्वप्न आणि आपली ध्येयं असतात.

देणं - एक देणगी याचा मी अनुभव घेण्याआधी मला वाटायचं की आपण जर काही देऊन टाकलं तर आता ते दुसऱ्याच्या मालकीचं होतं.आणि पूर्वी तुमच्याजवळ जेवढं होतं त्याच्यापेक्षा आता तुमच्याजवळ कमी असणार.

वास्तविकपणे,तुम्ही प्रेमानं काही देता,तेव्हा देणारा आणि घेणारा यांच्याजवळ जास्तच जमा होत.सुरूवातीपेक्षा.

" कृतज्ञता - एक देणगी या धड्यातून मी हे शिकलो की आपल्याला मिळालेल्या हेवा करण्यासारख्या आणि कौतुकास्पद गोष्टी आठवल्या,आणि त्यांचा आनंद लुटला तर आपल्याला प्रेमाची जाण आणि अनुभव मिळतो.'

" सरतेशेवटी एका दिवसाची देणगी या धड्यानं मला शिकवलं की,जगण्यातले फक्त चोविस तास राहिले आहेत असं समजायचं आणि मला शक्य तितकं प्रेम जाणवून आणि अनुभवून घ्यायचंय,जेणेकरून मी ते सहज हस्तांतरित करीन."

जेसन थांबला,आणि त्यानं घसा साफ केला.त्यानं प्रेम - एक देणगी याच्यात विशेष नैपुण्य मिळवलंय असं मला मनापासून वाटत असल्याचं मी त्याला सांगणार तोच त्यानं बोलणं सुरू केलं.

" प्रेम - एक देणगी याच्या व्याख्येचं शब्दांकन करण्याचा प्रयत्न मला कोणी करायला सांगितला तर मला रेड आजोबांनी माझ्यासाठी जे काही केलं,त्याचं उदाहरण देता येईल.मला या गेल्या वर्षात जे जे त्यांनी दिलं,जे जे माझ्यासाठी केलं,तेच याचं उदाहरण.आपण जेव्हा दुसऱ्या कोणावर खरंखुरं प्रेम करतो,तेव्हा आपण एक वेगळी व्यक्ती बनतो,आणि तशीच ती माणसं पण वेगळी बनतात.

"रेड आजोबांनी मला सर्वोत्तम देणगी देऊन त्यांचं माझ्यावरचं प्रेम उघड केलं,त्यामुळे माझ्यात कायमचं परिवर्तन झालं आणि बघा मी कोण झालो."

जेसननं उठून मिस् हेस्टिंग्जला उराउरी धरलं,वळून लिहिण्याच्या टेबलाच्या माझ्या बाजूस आला,आणि मला त्यानं कडकडून मिठी मारली.आमच्या दोघांचे त्याने,आम्ही जे जे केलं त्यासाठी आभार मानले,आणि भविष्यात तो आमच्या संपर्कात राहणार आहे,याची तो वाट बघत असल्याचं सांगितलं.

जेसननं दरवाजाच्या कडीला हात घातला तेव्हा,त्याला थांबवत मी म्हणालो,"एक मिनीटभरच थांब,जेसन. तुला माहित नाही अशी,सर्वोत्तम देणगीची आणखी एक पायरी आहे."

●●● समाप्त ●●●

5/31/26

सुखदेव / Sukhdev

त्याच्या ह्या बोलण्यावर माईला खरं तर नवल वाटलं. कारण शेत कसायला देताना मजूरपावती करण्याच्या वेळी बोलण्याच्या ओघात बापूंनी विश्वनाथ अन् राधू दोघंही सज्जन माणसं आहेत,त्यांच्याकडेही शेती भरपूर आहे,आपली जमीन लागूनच आहे,पुढेमागे आपण विकायला काढली तर आपल्याला प्राधान्य मिळावं म्हणून ते आपली जमीन कसायला मागताहेत.पण मी जमीन सुखदेवला देणार आहे कारण त्याला जरी पोटापुरतं मिळत असलं तरी त्याचा बारदाना काही फार मोठा नाही.त्यामुळे आपली जमीन कसायला जास्त वेळ तो देऊ शकेल,असं म्हटलं होतं.माईनी विचार केला,आपल्याला काही प्रत्यक्ष अनुभव नाही.सुखदेव म्हणतो त्याप्रमाणे रागाच्या भरात दिल्या असतील त्यांनी शिव्या.सुखदेव कशाला खोटं बोलेल ? त्यांनी सुखदेवला विचारलं,"बरं,तुझ्या जेवणाचं काय ? नसेल झालं तर गरम भाकरी आणि पिठलं करून वाढते."

सुखदेव नकार देत म्हणाला, "नका तरास घेऊ माई.मी एका दोस्ताबरोबर खाल्लंय.आता काही भूक न्हाई. सांजच्यालाच घरी जानार होतो.पन कामच आटोपलं न्हाई.आता अंधार पडल्यावर जाऊ नाही म्हन्तो, मघाशीच बाजारात जरा तनातनी झाली.कुनी सांगावं, रातच्याला काही दगाफटका झाला तर ? म्हून आज रातच्याला इथंच लवंडतो.काही हाथरायला आसलं तर द्या.बाहेर मारुतीच्या पारावर पडतो जाऊन.सकाळी झुंजूमुंजू झालं की जाईन.तीन कोसाचं तर अंतर. सकाळचा चा घरी जाऊनच पिईन."

माईंनी त्याला झोऱ्या दिला.पांघरुणाचं विचारलं तर नको म्हणाला.'उपरनं हाय,तेच घिईन पांघरायला.'असं म्हणून झोऱ्या घेऊन तो वाड्याबाहेर पडला.

माईंना तो तेव्हाही अस्वस्थच वाटला.त्याचं माईंच्या बोलण्याकडे लक्ष नव्हतं.पण हा बाजारात झालेल्या भांडणाचा परिणाम असावा,तरुण वयात लहानसहान गोष्टींमुळे मनाला त्रास होतो,असं वाटून माईनी तिकडे दुर्लक्ष केलं.

रात्रीचा साडेआठचा भोंगा वाजला.थोडावेळ अभ्यास करून मुलांचीदेखील झोपेची वेळ झाली. झोपण्याआधी माईच्या सांगण्यावरून यशाने बाहेर जाऊन ओट्यावरून पाहिलं,सुखदेव मारुतीच्या पारावर झोऱ्यावर पडला होता.पण झोपला नव्हता.सारखा ह्या कुशीवरून त्या कुशीवर वळत होता.

रात्री बाराच्या सुमारास जवळच्या श्रीकृष्ण टॉकीजमधून रात्रीचा शो संपला.

थोड्यावेळाने वाड्याचा दरवाजा खटखटण्याचा आवाज आला.माईची झोप सावध होती.त्या लगेचच उठल्या. त्यांनी आतूनच 'कोण आहे ?' विचारलं,

"माई,भी सुखदेव.इथे पारावर लई डेकनं चावत्यात. गावाबाहेर शनीच्या देवळात जाऊन झोपतो.पहाटंला झोऱ्या आनून देतो.मग गावाकडं जाईन."

"बरं." माई दार न उघडताच म्हणाल्या अन् परत अंथरुणावर येऊन पडल्या.पहाटे नेहमीप्रमाणे त्यांना जाग आली.प्रातविधी आटोपून त्यांचं भूपाळ्या म्हणणं चालू असतानाच सुखदेव झोऱ्या परत करायला आला. शनीच्या देवळात चांगली झोप लागली म्हणाला.आता त्याचा चेहराही शांत,समाधानी दिसत होता.ते पाहून माईंनाही बरं वाटलं.सुखदेव गेल्यावर माई आपल्या नित्याच्या कामाला लागल्या.यशा आणि मंदाची सकाळची शाळा असल्याने ते उठून त्यांच्या तयारीला लागले.नास्ता करून शाळेत गेले.माईंची देवपूजा झाली. मुक्ता मध्ये मध्ये लुडबुड करत होती.तिच्याशी बोलता बोलता माई कणीक भिजवत होत्या.तेवढ्यात सुखदेवचा आवाज आला.हा पहाटेच गावाला गेला आणि आता अकरा वाजता परत कशाला आला असेल ? ओच्याला हात पुसत माई स्वैपाकघरातून ओसरीवर आल्या.सुखदेव चौकातच उभा होता.त्याचा नेहमीचा तांब्याच्या वर्णाचा चेहरा तांबडालाल झाला होता शिवाय तो खूप थकलेला आणि चिंताग्रस्त वाटत होता.

"काय रे सुखदेव,काय झालं?" माईंनी काळजीच्या सुरात विचारलं.

"माई,तुम्हाला झोऱ्या देऊन गावाकडे गेलो तर आमच्या गावाच्या वेशीपाशीच

राधू, विश्वनाथ अन् त्यांचे सोयरे दिसले.रात्री ते खळ्यात झोपले होते.त्यांना कुणीतरी बेदम मारलं होतं म्हनं. चांगलेच सुजलेले दिसले.काल अमुशा.अंधार होता.अन् तोंडाला उपरनं बांधलं होतं म्हून मारनाऱ्यांची ओळख पटली न्हाई.पन त्यांचा वहीम माझ्यावर हाय. म्हून ते पोलीस कम्प्लेंट करायला इकडंच येत होते.मग मी घरी जाऊन चहा पिलो अन् उलट्या पावली माघारी फिरलो. संगटी बापपन आलाय.तो गेलाय पोलीस ठेसनात.मी तुमच्या कानावर घालायला हिथं आलू."

माईंना हे ऐकून आश्चर्यच वाटलं.त्या मनात म्हणाल्या, 'काय देव तरी एखाद्याच्या मागे लागतो बघा !'

"अरेपण,तू रात्रभर इथेच झोपलास,पहाटे माझ्यासमोरच झोऱ्या देऊन गावाकडे गेलास,तू कसा काय मारणार त्यांना ? त्या दिवशीच्या भांडणाच्या रागातून त्यांनी तुझं नाव घेतलं असणार."

माईंच्या बोलण्यामुळे सुखदेवच्या चेहऱ्यावरचा ताण कमी झाला."बघा ना माई,गरिबावर इनाकारन नाव घेत्यात.तुमची जमीन त्यांना कसायला दिली न्हाई म्हून हा राग.मी सांगू का पोलिसांना ? माईसाहेबांची साक्ष हाय! रात्री मी हिथंच होतो.बापूसाहेबांचा गावात अन् पोलिसात चांगला दाब हाय.त्यामुळे तुमच्या शब्दाला लई किंमत हाय.तुमच्या एका शब्दावर गरिबावरचं बालंट जाईल.न्हाई तर पोलीस धरून लई हान्तील इनाकारनच.त्या लोकाईचं काय हय ! लई बक्कळ पैका हाय त्याहीच्याकडं पोलिसांना दाबायला."

माई तात्काळ म्हणाल्या,"तू काही काळजी करू नकोस. खुशाल माझं नाव सांग.गरज पडली तर मी येईन कोर्टात साक्ष द्यायला."

माईंनी आश्वासन दिलं अन् त्याबरोबर सुखदेवचा चेहराच पालटला.त्याच्या चेहऱ्यावरची काळजी नाहीशी झाली.तो एकदम ताजातवाना दिसायला लागला.खरं तर,बापाला पोलीस स्टेशनात पाठवून सुखदेव ह्याच उद्देशाने वाड्यावर आला होता.माईंना 'तुम्ही साक्ष द्याल का?' हे विचारायची त्याची हिंमत होत नव्हती.पण कनवाळू माईंनी गरिबाला पोलिसांचा त्रास होऊ नये म्हणून स्वतःहून 'मी साक्ष द्यायला येईन' असं सांगितल्यावर सुखदेवने सुटकेचा निःश्वास टाकला. आता कुठलंही कोर्ट त्याला दोषी ठरवणार नव्हतं. किंबहुना आता पोलीस त्याला त्रास देण्याची सुतराम शक्यता नव्हती.गावातल्या एका प्रतिष्ठित घराण्यातल्या पापभीरू स्त्रीने सुखदेव त्या रात्री गावातच होता अशी साक्ष देणं हा सुखदेवचा हुकमी एक्का होता.तो तत्परतेने माईंच्या पाया पडला.माईंनीही त्याला 'काळजी करू नकोस, सुखी राहा',असा मनापासून आशीर्वाद दिला.माईंचा निरोप घेऊन सुखदेव पोलीस स्टेशनात जाण्यासाठी म्हणून वाड्याबाहेर पडला.माईही आपल्या कामाला लागल्या.संध्याकाळी पाचच्या सुमारास सुखदेवचा बाप वाड्यावर आला.सुखदेवला पोलिसांनी चौकशीसाठी थांबवून ठेवलंय असं सांगायला तो आला होता.

माईंनी दिलेला चहा घेऊन तो घरी जायला निघाला. निघताना अदबीने माईंना म्हणाला,"माईसाहेब,तुमच्या दर्शनाचा योग आता वारंवार येनार.ह्या पोलिसांच्या झंजाटात आन् कोर्टाच्या लफड्यात लै येळ जातो.ह्या वक्ताला तुमची जिमीन कसायला घेतली नसती तर बरं झालं असतं.ही दुष्मनी फक्त त्या जिमिनीसाठी हाय. काय करनार ? भोग हैती सगळे.ईट्टल... ईट्टल..."

आपली जमीन कसण्यामुळे सुखदेव अन् त्याचं कुटुंब अडचणीत सापडलंय ह्याचं माईंना फार वाईट वाटून कोनकोंडं वाटायला लागलं.त्या दिवशी पूजा करतानादेखील त्यांनी त्या कुटुंबासाठी प्रार्थना केली. दुसऱ्या दिवशी सुखदेवचा बाप सकाळी दहाच्या सुमारास आला.वाड्यावरून तो पोलीस स्टेशनात जाणार होता.डोक्याला पिवळं मुंडासं बांधलेला, काळ्याभोर रंगाचा,सुरकुतलेल्या कातडीचा आणि मिचमिच्या डोळ्यांचा सुखदेवचा बाप सारखा कपाळावर हात मारून म्हणत होता -

"माईसाहेब,काय भोग आलेत हो ह्या वयात... बघा, जाय-यायची दगदग,वरती पैसा परी पैसा... बाहेर जेवन,चहा... काय कमी खर्च येतो काय हल्लीच्या काळात..."

माईंना ते लगेचच पटलं.खरंच तर आहे.माईंनी मनाशी काही विचार केला.त्या सुखदेवच्या बापाला म्हणाल्या, "तुम्ही येत चला इकडे जेवायला.पोरांबरोबर तुम्ही दोघं. त्यात काय ? चार भाकरी जास्तीच्या टाकायला मला काही त्रास नाही." पडत्या फळाची आज्ञा सुखदेवच्या बापाने शिरसावंद्य मानली.

माईंनी 'जेवायला येत चला' असं सांगितल्यापासून सुखदेव कोर्टाच्या तारखेसाठी आला की,तो आणि त्याच्याबरोबर त्याचा बाप वाड्यावर जेवायला यायचे. कधी त्यांच्याबरोबर गावातले काही लोकही असायचे. आल्यावर सुरुवातीलाच 'तुमची जिमीन कसायला घेतली आन हा कुटाना झाला बघा!' ही लापनिका दरवेळेस असायची.बरोबरचे लोकसुद्धा झिलकऱ्यासारखं त्यांच्या हो ला हो मिळवायचे.

खेड्यात मोकळ्या हवेत राहणाऱ्या आणि चार कोस सहज चालणाऱ्या ह्या मंडळीचा आहार चांगलाच दांडगा होता.एक एक जण एका बैठकीत चार-पाच भाकऱ्या सहज फस्त करी.संध्याकाळी परत चहाला हजर.ही मंडळी येऊन गेली की,थकलेल्या माई कापडाचं फटकुर डोक्याला घट्ट बांधून पडून राहत.ह्या मंडळीचं येण्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चाललं.त्याबरोबर त्यांच्यासोबत येणाऱ्यांची माणसांची संख्याही वाढत चालली होती.

एकदा जेवण झाल्यावर ओट्यावर ही मंडळी चंची काढून गप्पा हाणत बसली होती.तेव्हा त्यांच्या गप्यावरून त्यातले काही जण लग्नाचा बस्ता बांधायला आले होते,लग्नाचं कापडचापड खरेदी करणाऱ्या लोकांना सुखदेवचा बाप वाड्यावर जेवायला घेऊन आला होता,हे यशाला कळलं.त्याने ते माईंच्या कानावर घातलं.नंतर एकदा कोर्टाची तारीख म्हणून रविवारीच मंडळी आली.यशाने माईला हळूच कानात आज रविवार असल्याचं सांगितलं.माईंना सात्त्विक संताप अनावर झाला.त्यांनी सुखदेवच्या बापाला त्याचा जाब विचारला.तर तो धूर्त म्हातारा चपापला पण क्षणभरच. लगेच स्वतःला सावरून म्हणाला,

"माईसाहेब,सुखदेवच्या सांगन्यात गलती झाली.कोर्टात नाही तर वकिलाकडे जायचंय.त्यांनी बलिवलं मजूरपावतीचा कागुद घिऊन.काय है ना,ह्या तकलिफीनी पोराचं डोस्कं पन लै पिकून गेल्यागत झालंय.त्याला माफी करा.ह्या वक्ताला तुमची जिमीन कसायला घेतली नसती तर बरं झालं असतं... ही दुष्मनी फक्त त्या जिमिनीसाठी हय.काय करनार ? भोग हैती सगळे..."

आता माईंना ह्या लोकांची लबाडी लक्षात आली होती. मात्र ह्यातून बाहेर कसं पडावं,हे सुचेना.कोर्टात साक्षीला येते हे भावनेच्या भरात माई बोलून गेल्या होत्या. त्यामुळे बापूंना सांगण्याची आता त्यांनाही भीती वाटत होती.ह्या सगळ्या प्रकाराची बापूंना ते मुंबईत असल्याने काहीच कल्पना नव्हती.

पुढच्या वेळेला मंडळी आली.त्यांना जेवायला घालताना आपण फसवले जात आहोत,आपल्या चांगुलपणाचा ही मंडळी गैरफायदा घेत आहेत,ही माईंच्या मनातली भावना तीव्र झाली.योगायोगाने त्याच संध्याकाळी पुरुषोत्तम घरी आला.पुरुषोत्तम गावचा तलाठी होता. यशाचा मोठा भाऊ अशोक ह्याचा वर्गमित्र होता. पुरुषोत्तम बारा गावचं पाणी प्यायला होता.माईंना डोकं बांधून पडलेलं पाहून त्याने त्यांच्या तब्येतीची चौकशी केली आणि बोलण्याच्या ओघात त्याला माईंच्या डोकेदुखीचं कारण कळलं.आपल्या आईसारख्या असलेल्या आणि साध्या भोळ्या अशा माईंना झालेला त्रास ऐकून त्याचं माथं भडकलं.वरकरणी शांतपणा दाखवून त्याने माईंना विचारलं,

"पुन्हा कधी येणार आहेत ही मंडळी,काही कल्पना आहे का ?"

"मंगळवारी.बाजाराच्या दिवशी.आज मी ओट्यावर मैत्रिणीबरोबर ठिक्कर ठिक्कर खेळत होते ना,तेव्हा ते जायला निघाले होते.तेव्हा वाड्याबाहेर पडताना ते बोलत होते.तेव्हा मी ऐकलं." धाकटी मुक्ता पटकन् म्हणाली.

त्यावर पुरुषोत्तम म्हणाला "माई,मी मंगळवारी साडेदहा अकराला येतो.बघतो,तुमची जमीन कसण्यामुळे ह्या गरीब कुटुंबाला किती त्रास झालाय ते."

बोलल्याप्रमाणे मंगळवारी बरोबर साडेदहा वाजता पुरुषोत्तम घरी आला.ओसरीवर न बसता तो मुद्दाम आतमध्ये स्वैपाकघरात माईंशी गप्पा मारत बसला. अकराच्या सुमारास सुखदेव,त्याचा बाप आणि त्यांच्याबरोबर चौघेजण वाड्यात शिरले.ओसरीवर आलेल्या माईंना सुखदेवचा बाप म्हणाला,

"माईसाहेब,आज आम्ही सहाजनं जिवायला हाय बरं का,काय करनार ? तुमच्या जिमिनीमुळं जिवाला लै घोर झालाय..."

त्याचं वाक्य पूर्ण होतं न होतं तोच स्वैपाकघरातून पुरुषोत्तम बाहेर आला.त्याचा चेहरा संतापाने लाल झाला होता.त्याने दरडावून विचारलं,"काय रे भडव्या, खानावळीत वर्दी द्यायला आलास काय ? आणि हे बरोबर आणलेले लोक काय तुझ्या मयताला बरोबर आणलेस का काय ?"

पुरुषोत्तमचं एकंदर रूप अन् बोलणं ऐकून सुखदेवच्या बापाचे मिचमिचे डोळे विस्फारले गेले.कुणाला काय बोलावं ते समजेना.

पुरुषोत्तम पुन्हा ओरडला,"तुमचा बाप मुंबईला गेला तो काही कायमचा नाही गेला.तुम्ही ह्या देवीसारख्या बाईला फसवून कोर्टात साक्ष द्यायला मजबूर केलंत. आणि तू रे ए भुऱ्या,रात्री शनीच्या देवळात झोपायला जातो सांगून सरळ गावाला गेलास.त्या दोघांना गुरासारखं बेदम मारलंस.साळसुदासारखा सकाळी परत वाड्यावर येऊन झोऱ्या परत केलास नि गावाला निघालो असं सांगितलंस.रस्त्यात राधू अन् विश्वनाथ भेटल्यावर घरी जाऊन म्हाताऱ्याला घेऊन परत आलास.मी शनीमंदिराच्या पुजाऱ्याकडे चौकशी केली. त्या रात्री शनीमंदिरात तू गेलाच नव्हतास.खरं की नाही ?” आता सुखदेवचं धोतर ओलं व्हायचं शिल्लक राहिलं होतं.त्याचा बेरकी बापदेखील भीतीने लटलटा कापायला लागला.पुरुषोत्तमच्या आणि माईंच्या पायांवर लोळण घेत ते दोघे विनवण्या करत म्हणाले,

"एक डाव माफ करा.लै मोठी चूक झाली आमच्या हातून.परत वाड्यावर येनार नाही.बापूसाहेबांच्या कानांवर पन ही गोष्ट घालू नका." पुरुषोत्तम म्हणाला,"बापूसाहेब राहिले मुंबईला.निघा आता.नाही तर फौजदाराच्या कानावर मीच तुमचा पराक्रम घालतो,मग बघा,तो तुमची कशी सालटी काढतो ते."

मान खाली घालून सगळी मंडळी बाहेर पडली.माईंकडे वळून पुरुषोत्तम म्हणाला,"माई,आज तुमच्या खानावळीत एक पात्र माझं बरं का.खूप दिवसांत तुमच्या हातचं जेवण जेवलो नाही."

आज कितीतरी दिवसांनी माई मनमोकळं हसल्या.

●●● समाप्त ●●●



5/29/26

सुखदेव / Sukhdev

रात्री जेवण झाल्यावर बापू ओसरीवर तक्क्याला टेकून पान खायला बसले.थोड्या वेळाने स्वैपाकघरातलं आवरून माईपण बाहेर आल्या.मंदा,मुक्ता आणि यशा आजूबाजूला घुटमळत होते.कारण जेवतानाच बापूंनी म्हटलं होतं की,'माईचं आटोपलं की,मला तुम्हा सगळ्यांशी एका महत्त्वाच्या विषयावर बोलायचं आहे.'

आठवीतला यशा,सहावीतली मंदा अन् चवथीतली मुक्ता ह्या सगळ्यांना आपण खूप मोठं झाल्यासारखं वाटायला लागलं.ह्या आधी कधीच बापूंनी किंवा घरी येणाऱ्या कुठल्याही पाहुण्यांनी त्यांच्याशी कधी कुठल्या विषयावर 'चर्चा' केली नव्हती. उलट घरात काही महत्त्वाची चर्चा चालू असेल तर मुलांना बाहेर पिटाळलं जायचं.त्यातल्या त्यात मंदा अन् मुक्ता ह्यांना तर नक्कीच.कारण यशा काहीतरी निमित्त काढून घरात घुटमळायचा आणि कान पाडून मोठी माणसं काय बोलतात ते ऐकायचा.आज मात्र बापूंनी माईच्या बरोबर त्या तिघांनाही चर्चा करणार असल्याचं सांगितलं.जेवण झाल्यावर मधल्या वेळेत तिघांनी ओट्यावर बसून अंदाज बांधण्याचा प्रयत्न केला.यशा त्यांच्यात मोठा.तो म्हणाला,

"लक्ष्मी आणि पार्वतीबरोबर आणखी एखादी गाय विकत घेणार असतील."(गावगोत,माधव सावरगांवकर,प्रकाशक - संजय शिंदे - अष्टगंध प्रकाशन..)मंदाला वाटलं,

अभ्यासाबद्दल काही तरी असेल.'जास्त मार्कस मिळवायला पाहिजे' वगैरे काही तरी सांगणार असतील.

मात्र बापूंनी अनपेक्षितपणे धक्काच दिला ! बापूंना एका वर्षासाठी मुंबईच्या ऑफिसमध्ये कामासाठी जावं लागणार होतं.आजच ही गोष्ट त्यांना समजली होती.ती ऐकून माईसकट सगळ्यांनाच धक्का बसला.बापूंशिवाय घर ही कल्पनाच कुणी केली नव्हती! माईना तर काही बोलणंच सुचेना.

"अहो पण,हे कसं शक्य आहे? मी एकटी ह्या कच्चाबच्चांना घेऊन सगळं कसं सांभाळणार ? दुसरा काही मार्ग नाही का ?"

माईचंदेखील खरंच होतं.माईंचं जग उंबरठ्याच्या आतच सीमित होतं.बाहेर जाणं म्हणजे मंगळवार-शुक्रवार देवीला,शनिवारी शनिमंदिरात.एवढाच त्यांचा बाहेरच्या जगाशी संबंध यायचा.घरी सकाळपासून देवाची स्तोत्रं म्हणत,भूपाळ्या म्हणत,सडासंमार्जन,घराची झाडझूड, पार्वती-लक्ष्मी ह्या दोघींची निगा राखणं,त्यांचं चारापाणी बघणं अन् सगळ्यांच्या स्वैपाकाचं पाहणं... ही सगळी कामं माईंची.ह्या व्यतिरिक्त सगळं बापू करत किंवा करवून घेत.बापू रेव्हेन्यू खात्यात मामलेदार होते.त्यांचा दरारा होता.भाजीपाला-वाणसामान आणायला सीताराम चपराशी होता.तोच गुरांसाठी कडबा,घास, पेंड विकत आणून द्यायचा.बापू वर्षभर नसल्यावर आता घर कसं काय चालणार,घरातल्या लोकांशिवाय माईंचं बोलणं फक्त मारवाड्यांशी,रंगीशी आणि गल्लीतल्या इतर बायांशी होत असे.खरं तर,पार्वती आणि लक्ष्मी ह्यांच्याशीच ती जास्त बोलत असे. बापूही तिला म्हणत,'ह्या गायींशी काय तासन्तास बोलत असतेस ग? आणि त्याही तुझं बोलणं समजत असल्यासारखं ऐकतात.'तर सांगायचं असं की,बापू मुंबईला जाणार म्हटल्यावर माईना अन् मुलांना डोक्यावरचं छप्परच गेल्यासारखं वाटू लागलं.बहुदा बापूंना ह्याचा अंदाज आधीच होता. त्यांनी बोलायला सुरुवात केली..

"यशा काही आता लहान नाही.चांगला चौदा वर्षांचा आहे.तो बाहेरचा व्यवहार पाहील.काय हवं नको ते बाजारातून आणील.

तसा सीतारामपण मधूनमधून चक्कर मारील.पण त्याला आताच्या सारखं दररोज यायला काही जमणार नाही.पैशाचे व्यवहारपण आजपासून यशा पाहील."

बापूंनी जानव्यात बांधलेली पेटीची किल्ली यशाला दिली.यशाला आपण एकदमच मोठे झालो असं वाटलं !

"यशा,ट्रंकेत एक चंदनी पेटी आहे,त्यात पैसे आहेत. हिशेब लिहिण्याची वहीपण तुला देतो.त्यात सगळा हिशेब लिहून ठेवायचा.मागच्या महिन्यात सुखदेवने धान्य,गुळाची ढेप अन् चिंच आणून पोहचवलीय. वाणसामान मारवाड्याच्या दुकानातून आणायचं.मी मधूनमधून आल्यावर त्याचा हिशेब चुकता करत जाईन. सुखदेवची मजूरपावती नुकतीच लिहून घेतली आहे.ह्या वेळेला विश्वनाथ अन् राधू 'जमीन कसायला द्या' म्हणून मागे लागले होते.पण सुखदेवकडून मागच्या वर्षीचं धान्य यायचं बाकी होतं अन् गावच्या राजकारणात आपल्याला रस नसल्याने जमीन ह्या वर्षी सुखदेवकडेच ठेवलीय.त्यामुळे ते दोघे- विश्वनाथ अन् राधू नाराज झालेत.सुखदेवसारखीच त्यांचीही जमीन आपल्या शेताला लागून आहे.त्यामुळे त्यांना आपली जमीन कसण्यात स्वारस्य होतं.पण ते आता पुढच्या वर्षी बघू या.सुखदेव चेहऱ्यावरून गरीब वाटतो.पण तरुण असल्याने रांगडा आहे.अर्थात ह्या सगळ्याशी तुमचा काही संबंध येणार नाही.यशा घराकडे, मंदा-मुक्ताकडे नीट लक्ष दे.माईला काय हवं नको ते बघ."बापूंचं हे बोलणं ऐकून माईना हुंदकाच आला. कोंबडी आपल्या पिलांना पंखाखाली घेते तसं त्यांनी यशा-मंदा-मुक्ताला जवळ ओढून घेतलं.

"मुंबई काही लांब नाही.काहीही अडचण आली तर मला पत्र टाका,मी पाठवलेलं उत्तर तुम्हाला आठ दिवसांत मिळेल.चारसहा महिन्यांनी मी इकडे चक्कर मारीनच. काय यशा,जमेल ना तुला?" बापूंनी विचारलं.यशा फुशारून गेला होता.मोठ्या माणसासारखं म्हणाला,“बापू,तुम्ही इथली काही काळजी करू नका."

माई पहिल्या धक्क्यानंतर आता सावरल्या होत्या. यशाला असं मोठ्या माणसासारखं बोलताना पाहून त्यांना खूप बरं वाटलं.

त्याच्या केसांतून हात फिरवत त्या म्हणाल्या,"मोठं झालंय पोरगं.आणि हो,तुम्ही काही काळजी करू नका.गावात अन् गल्लीत आपल्या कुटुंबाबद्दल आदर अन् आपुलकी आहे.वेळप्रसंगाला मध्यरात्रीसुद्धा सगळे धावून येतील.अशोक जरी गाव सोडून मुंबईला गेला असला तरी त्याचे मित्र शंकर,बद्री, पुरुषोत्तम हे आहेत ना.माझी खात्री आहे,तुम्ही इथे नाही हे समजल्यावर तेदेखील अधूनमधून चक्कर मारत जातील.तुम्ही निश्चिंत मनाने जा.मी घर आणि मुलांना सांभाळीन.तुम्ही सांगता ना,तुमचे वडील गेले तेव्हा तुम्ही जेमतेम आठ वर्षांचे होतात.यशा तुमचाच मुलगा आहे. मला त्याची चांगली मदत होईल.शिवाय वरचेवर आम्ही तुम्हाला पत्र पाठवत जाऊ."

झालं.चर्चा संपली.माईच्या मनावर नाही म्हटलं तरी थोडं दडपण आलं.यशाला आपण एकदम खूप मोठं झाल्यासारखं वाटू लागलं आणि मंदा-मुक्ताला आपल्याला काय वाटतंय हे नीटसं समजलं नाही.पण बापू गेल्यावर आपणदेखील माईला कामात मदत करायची असं त्यांनी आपल्या गुप्तचर्चेत ठरवलं.

ठरल्याप्रमाणे पुढच्याच आठवड्यात बापू मुंबईला गेले. साऱ्यांचेच पहिले एकदोन दिवस खूपच अस्वस्थतेत गेले.माईंच्या भाषेत सांगायचं तर सगळ्यांना उघड्यावर पडल्यासारखं वाटायला लागलं आणि असं वाटणं स्वाभाविकच होतं.कारण तिन्ही मुलांसकट घर व्यवस्थित सांभाळण्याची जबाबदारी आता एकट्या माईवर येऊन पडली होती.शिवाय पार्वती अन् लक्ष्मी ह्याही होत्याच.पार्वती गाभण होती.तिचे दिवस भरत आले होते.रात्री-बेरात्री ती अडली तर गवळीवाड्यातून पांडूला बोलवावं लागणार होतं.यशा मात्र अचानक मोठा झाल्यासारखा वागू लागला होता.घराची सगळी जबाबदारी घेण्याचा प्रयत्न करत होता.

बाहेरची सगळी कामं करत होता.माईना त्याचं कौतुक वाटत होतं आणि कधी कधी अवेळी आलेल्या पोक्तपणाच्या त्याच्या भाषेचं त्यांना हसूदेखील यायचं.मंदा-मुक्ता मधूनमधून येऊन माईना काही मदत करू का म्हणून विचारायच्या. खरं तर,बापू इथे नसल्याने पडणाऱ्या कामांपैकी कुठलंच काम त्या करू शकणार नव्हत्या.तरीपण ह्या नव्या परिस्थितीत आपण काही तरी खारीचा वाटा उचलावा ही त्यांची भावना मात्र कौतुकास्पद होती.

एकंदरीत घर व्यवस्थित चाललं होतं.बापूंना मुंबईला जाऊन एक महिना झाला होता.त्यांचं एक पोहचल्याचं आणि नंतर खुशाली विचारणारंही पत्र येऊन गेलं. बापूंच्या पत्रांना उत्तर पाठवणं हा एक मोठा कार्यक्रम असायचा.सगळे एकत्र बसत.माई समोर बसून बापूंशी बोलताहेत अशा स्वरूपाची वाक्यं सांगत.यशा त्याच्या बालबुद्धीप्रमाणे आणि वर्गात पत्रलेखनाच्या तासाला शिकवल्याप्रमाणे त्याचं रूपांतर करी.माईच्या मजकुरात बारीकबारीक गोष्टी विस्ताराने असत.उदाहरणार्थ :

'कालच पार्वती व्यायली.गोऱ्हा झाला.चांगला लांबरुंद आहे.

पांढऱ्या रंगाचा आहे म्हणून मुली 'ढवळ्या' नाव ठेवू या म्हणत होत्या.पण यशाला 'नंद्या' नाव आवडलंय तुम्हाला काय वाटतं? पार्वतीला घुगऱ्या शिजवून घातल्या.ह्या दिवसांत चांगल्या असतात शिवाय काथबोळ पण दुकानातून आणला.तिला कणकेच्या गोळ्यातून दिलाय.काथबोळाने दूध चांगलं सुटतं म्हणतात तेवढंच गोऱ्ह्याचं पोट भरायला बरं.'

मंदा-मुक्तालादेखील आपण घरात केलेल्या मदतीबद्दल लिहावं असं वाटायचं.माईसुद्धा आठवणीने त्या तिघांचं भरपूर कौतुक करणारा भजकूर यशाला सांगत.तो ऐकत असाताना आणि लिहीत असताना त्यांचे फुलून आलेल चेहरे पाहण्यात माईना खूप समाधान वाटे. बापूंच्या उत्तरातदेखील त्या तिघांचं आठवणीने कौतुक केलेलं असे.माईच्याही कौतुकाचा आडवळणाने उल्लेख असे.यशाला त्या अर्धवट वयातही तो लक्षात येई. त्यावेळी तो माईच्या चेहऱ्याकडे पाही.माईसुद्धा कृतकोपाने यशाला म्हणत,"पुढे वाच.मध्येच का थांबलास?आणि इकडे तिकडे काय पाहतो आहेस?" तसा यशा पुढचं पत्र वाचायला लागे.

मंगळवारी गावचा आठवडेबाजार असे.खेड्यापाड्यातले लोक त्यांचं धान्य-भाजीपाला-फळं विकायला घेऊन येत.घरी जाताना वाणसामान,कधी कापडचोपड विकत घेऊन जात.एखादा प्रेमळ लेकुरवाळा पोरांसाठी रेवड्या,गुडीशेव,गुडदाणी कागदात बांधून घेई.खेळण्याच्या दुकानातून एखादी भडक रंगाची पिपाणी किंवा शिट्टी घेऊन पोरांची खूश झालेली तोंडं पाहायला उत्सुक असे.

यशाची शाळा सकाळची असे.बाजाराच्या दिवशी शाळा दोन तास लवकर सुटायची.अशाच एका मंगळवारी यशा शाळेतून घरी आला आणि पिशव्या घेऊन लगेच बाजाराला निघाला.यशाचा बाजार सोप्पा होता.मेथी, टमाटे,दुधीसारख्या स्वस्त भाज्याच तो घेई.

कारण पैसे पुरवून वापरणं ही सध्या त्याची जबाबदारी होती.खाऊ म्हणून तो फक्त केळी घेई.केळी तिथलंच उत्पादन होतं. त्यामुळे स्वस्तही असत.माईंनी सांगितलेला गवताचा भारापण घासाघीस करून घेतला.बाजारात त्याला लांब कुणाशी तरी तावातावाने बोलत असलेला सुखदेव दिसला.तो ज्याच्याशी बोलत होता,त्याला यशा ओळखत नव्हता.यशाने घरी आल्यावर पिशवी रिकामी करताना माईच्या कानावर ही गोष्ट घातली.अर्थात त्यात काही विशेष नव्हतं.पण बापूंनी तिन्ही मुलांना एक गोष्ट आवर्जून सांगितली होती की,'घरात किंवा शाळेत किंवा इतर कुठेही नेहमीपेक्षा काही वेगळी गोष्ट घडली तर ती आठवणीने येऊन माईला सांगायची.कारण तुम्ही लहान आहात.तुम्हाला त्या गोष्टीचं महत्त्व कळणार नाही पण माईला ती गोष्ट महत्त्वाची वाटू शकेल.'

यशाने जेव्हा माईना सुखदेवला कुणाशी तावातावाने बोलताना पाहिल्याचं सांगितलं तेव्हा त्यांनादेखील त्यात विशेष काही वाटलं नाही.आला असेल तो काही खरेदी करायला.घरात लहान मुलंबाळं आहेत.त्यांच्यासाठी काही कापडचोपड खाऊबिऊ घ्यायला.

कदाचित घरी परत जाण्याच्या आधी संध्याकाळी वाड्यावर चक्कर मारून जाईल.संध्याकाळी देवीच्या दर्शनाला जायच्या आधी माईनी यशाला कल्पना देऊन ठेवली अन् म्हटलं,

"बाहेर अंगणातच खेळ.मी नसताना सुखदेव आलाच तर मंदाला सांग चहा करून द्यायला."

माई देवीच्या दर्शनाला जाऊन आल्या.रात्री सगळी जेवायला बसली.तोवर सुखदेव आला नाही.माईंनी विचार केला,झाला असेल उशीर म्हणून परस्पर गेलाही असेल.जेवणं होऊन माई स्वैपाकघर आवरत असताना सुखदेव आला.माईना तो जरा अस्वस्थ वाटला.त्यांनी त्याला तसं विचारलं तर म्हणाला,"विश्वनाथ अन् राघूशी थोडी बोलणी झाली.लई वंगाळ शिव्या दिल्या.”

कथा शिल्लक राहिलेली पुढील लेखामध्ये…!

5/27/26

म्होरक्याचा अस्त / Leader's level

मंकी हिलवर पुन्हा सगळं स्थिरस्थावर झालं होतं. माझं जाणं-येणं पुन्हा पहिल्यासारखंच सुरू होतं. गौरी-राणी-राजीही जणू काही घडलंच नाही असं वागत होत्या.

त्यांच्या दृष्टीने खरोखरच वेगळं काही घडलं नव्हतं.मी त्यांच्या पिल्लाला घाबरवलं होतं आणि त्यावरची प्रतिक्रिया म्हणून त्यांनी माझ्यावर हल्ला केला होता.ही घटना घडून गेल्यावर काही महिन्यांनंतरची गोष्ट असेल.पावसाळ्याचे दिवस होते.एके दिवशी प्रचंड पाऊस लागला होता.मंगळवारचा सुट्टीचा दिवस आणि पावसाचा जोर म्हणून आम्ही सगळ्या माकडांना उबदार इनडोअर सेक्शनमध्ये ट्रॅप करायला लागलो.आत त्यांच्यासाठी हीटिंग लॅम्प लावलेले होते.गौरी,संपत, राणी,राजी,पिल्लं सगळे आत गेले;पण आक्क्याला मात्र काही केल्या आत यायचं नव्हतं.त्याला काय झालं होतं कोण जाणे,दिवसभर तो झाडावरच मुसळधार पावसात भिजत राहिला.रात्रही तशीच गेली.सकाळी ज्याची भीती होती तेच झालं.मंकी हिलपाशी येऊन पाहिलं तर आक्क्या तापाने फणफणलेला.त्याला लगेच पार्कच्या हॉस्पिटलमध्ये भरती केलं;पण इतका वेळ पाण्यात भिजल्यामुळे त्याला न्युमोनिया झाला.काही केल्या ताप उतरेना.उलट वाढतच गेला.आमच्या ध्यानीमनी नसताना आठ दिवसांत तो गेलाच.

आक्क्याच्या जाण्याने मंकी हिल हादरून गेलं. आक्क्या बरा होऊन परत येईल,या आशेवर गौरी सतत हॉस्पिटलकडे डोळे लावून होती.आक्क्या गेल्यानंतर दोन-तीन आठवडे गौरीची आशा कायम होती. आक्क्याच्या जागेवर बसून ती आक्क्याला नेलं त्या दिशेकडे टक लावून बघत राहायची.आक्क्या आणि गौरीचं बाळ (म्हणजे मोबाइल) आता वर्षाचं झालं होतं. राजीचा चिकूही आईला सोडून थोडाफार हिंडू फिरु लागला होता.राणीचा भिकू मात्र तान्हाच होता.भिकू हा संपतचा मुलगा.तोही संपतसारखाच भित्रा होता. आक्क्याविना असतोच.तो साधारणपणे इतरांपेक्षा दाणगट,टग्या असतो.बहूधा तो नरच असतो.त्यामुळेच या पदाला अल्फा मेल असंही म्हणतात.टोळीचे महत्त्वाचे निर्णय त्यानेच घ्यायचे असतात.एखादा शत्रू आला तर त्यानेच हल्ला करणं अपेक्षित असतं.मंकी हिलवरच्या कुठल्याही पिल्लावर एखादी घार किंवा अन्य शिकारी पक्षी झेपावला,तर आक्क्याच त्याचा हल्ला परतवून लावत असे.आक्क्याची जागा घ्यायला भित्रा संपत सक्षम नव्हता.त्याचा पिंडच आज्ञा स्वीकारण्याचा होता.पांडू असता तर नक्कीच त्याने ही जागा भरून काढली असती.पण तो तर केव्हाच पळून गेला होता.आम्ही आता या टोळीकडे अधिक कुतूहलाने पाहू लागलो.आक्क्या आपल्या नेहमीच्या फांदीवर बसून रुबाबात फांदी गदागदा हलवत आपले वर्चस्व सिद्ध करत असे.त्या जागेवरून परिसराची टेहेळणी करत असे.आक्क्याच्या निधनानंतर गौरी आता त्याच्या जागेवर बसून राहू लागली.

एकदा पार्कबाहेरच्या रस्त्यावर भटकी कुत्री पकडायची गाडी आली आणि गौरीने त्याच जागेवरून आक्क्यासारखाच ख्व्यॉक व्यॉक आवाज काढून आपल्या कंपूला धोक्याचा इशारा दिला.

आम्हाला आश्चर्य वाटलं आणि तिच्या त्या समंजस वागण्याचा आनंदही झाला.एके काळची लाजरी-बुजरी गौरी आता चक्क टोळीची 'अल्फा' झाली होती.

माकडांच्या कंपूला आता गौरीच्या रूपाने 'अल्फा फिमेल' मिळाली आणि इतरांनीही बिनबोभाट तिचा स्वीकार केला.माकडांसाठी वाढलेल्या जेवणाचा पहिला मान गौरीला मिळू लागला.स्वभावाने लाजरी असली तरी मुळात ती अंगापिंडाने इतर माकडिंणींपेक्षा,अगदी संपतपेक्षाही तशी मजबूत होती.आश्चर्य म्हणजे टोळीचं म्होरकेपद स्वीकारल्यावर गौरीचा आहारही बदलला. सर्वांसाठी दिलेल्या खाण्यातले चांगलेचुंगले पदार्थ वेचून ती खाऊ लागली शिवाय आहाराचं प्रमाण वाढलं. त्यामुळे वजनही वाढलं.स्वभावात जरब आणि आक्रमकता आली.गौरी टीम लीडर झाल्यामुळे अर्थातच तिने मोबाइलवर लक्ष केंद्रित केलं.आक्क्याचा मुलगा असल्याने त्याला टोळीत विशेष स्थान होतं. त्यामुळे लवकरच त्याने आपल्या आईच्या डेप्युटीची जागा घेतली आणि संपत आपसूकच तिसऱ्या स्थानावर गेला.आणखी एक वर्ष गेलं. (सोयरे - वनचरे - अनिल खैर,समकालीन प्रकाशन)

या काळात गौरीने मोबाइलला चांगलंच तयार केलं. तिलाही न जमणाऱ्या कसरती त्याच्याकडून करवून घेतल्या;घार,घुबड व अन्य पक्ष्यांचे हल्ले परतवून लावायला शिकवलं.बापाचे नेतृत्वगुण त्याच्या स्वभावात होतेच.लवकरच मोबाइल पूर्ण प्रौढ झाला.रुंद खांदे, प्रचंड ताकद,चमकदार केसांचा कोट,अत्यंत सावध नजर आणि धाडसी स्वभाव.या टोळीचा पुढचा म्होरक्या हाच,हे आम्हाला कळून चुकलं.त्याप्रमाणे एके दिवशी सहजच त्याने आक्क्याच्या जागेवर जाऊन व्याँक.. ळ्याँक अशी आरोळी ठोकली आणि गौरीसकट सगळ्यांनी त्याच्या नेतृत्वाला मान्यता दिली आणि आमचा छोटा मोबाइल मंकी हिलचा अल्फा मेल झाला. 

थोडक्यात बचावलो…

नोव्हेंबर महिन्यातल्या एका गुरुवारी सर्पकुंडाचं काम करणाऱ्या गणपतची साप्ताहिक सुट्टी होती.राऊतलाही यायला आज उशीर झाला होता.सर्पकुंडामध्ये थोडा कचरा पडलेला दिसला.पाणीही गढूळ झालं होतं. म्हणून मी सर्पकुंडामध्ये उतरून साफसफाई करू लागलो.पाणी बदलून होत असतानाच चिखलीमधल्या मैला शुद्धीकरण केंद्रातील एक कर्मचारी घाईगडबडीत आला अन् म्हणाला,"साहेब,आमच्या प्लांटवर साप आल्याती.चला चला,लवकर चला." मी पिटबाहेर आलो,साप पकडण्याची हुक स्टिक घेतली आणि त्याच्यासोबत निघालो.मैला शुद्धीकरण प्लांटवर त्या वेळेस गांडूळखत प्रकल्प चालू होता.कुजणारा कचरा,पालापाचोळा,त्यातून निर्माण होणारे सूक्ष्म कृमी,ते खाण्यासाठी येणारे पक्षी, उंदीर आणि उंदरांच्या मागावर येणारे साप असं सगळं पोषक वातावरण होतं.तिथल्या पाचोळ्यामध्ये घोणस जातीच्या सापांची जोडी शांतपणे विसावली होती.नर साधारण तीन फूट लांबीचा होता.त्याला हुक स्टिकने अलगद पकडून पिशवीमध्ये ठेवला.त्या गडबडीत मादी तिथे पडलेल्या फूटभर व्यासाच्या सिमेंट पाइपमध्ये जाऊन दडली.तिथल्या लोकांना एका बाजूकडून पाइप उचलायला सांगून दुसऱ्या बाजूकडून साप बाहेर येण्याची सावधपणे वाट पाहू लागलो.

अपेक्षेप्रमाणे ती मादी माझ्याकडच्या बाजूला वेगाने बाहेर आली.सुमारे साडेतीन फूट लांबी,त्रिकोणी डोकं,तपकिरी रंग आणि त्यावर ठळक बदामी रंगाचे ठिपके.अतिशय चपळ होती ती.मी आजवर हाताळलेल्या घोणसांपेक्षा ती जरा वेगळीच वाटली.हुक स्टिकच्या साहाय्याने तिला उचलेपर्यंत ती तीनदा निसटली.मोकळ्या जागेतून ही बया झाडाझुडपांमध्ये गायब झाली असती तर पुन्हा सापडणं अवघड झालं असतं.म्हणून मी एका झटक्यातच डाव्या हाताने तिचं शेपूट धरून तिला मोकळ्या जागेत आणली.हुक- स्टिक तिच्या समोर धरली.तेवढ्यात ती झटकन वळली आणि हुक-स्टिकला चकवून तिने माझ्या गुडघ्यावर हल्ला केला. तिचा उजवा विषदंत पँटच्या कापडातच अडकला,पण डावा विषदंत मात्र पँटमधून गुडघ्यापर्यंत पोचलाच. तिला चावण्यासाठी म्हणावी तशी ग्रिप मिळाली नसली तरी थोडं तरी विष पसरलं असणारच.मी एका क्षणात पँट काढली आणि शेजारीच असणाऱ्या अनिल राऊतकडे स्टिक दिली.साप पकडण्याचं काम त्याच्यावर सोपवून मी बाहेर धावलो.

दरम्यान,तिथल्या प्लांटवरचे एक अभियंता संजय खाबडे त्यांची कार घेऊन आले. गाडीत मी कसाबसा बसलो.त्यांच्या मोबाइलवरून मी आधी अण्णाला फोन लावला.वायसीएमला अ‍ॅडमिट व्हायला सांगून त्याने मला धीर दिला आणि सूत्रं हातात घेतली.त्यानंतर तो सतत खाबडेसाहेबांच्या संपर्कात होता.

दरम्यान,मी पालिका आयुक्तांच्या ऑफिसमध्ये फोन करून जे घडलंय त्याची कल्पना दिली.हॉस्पिटलमध्ये पोहोचण्याआधी अण्णाचा पुन्हा फोन आला, वायसीएमएला अँटिव्हेनम इंजेक्शन तयार आहे. त्यापाठोपाठ आयुक्तांच्या पीएचाही फोन,डॉ.फडणीस आणि इंजेक्शन्स तयार आहेत.लवकरात लवकर पोहोचा.पंधरा मिनिटांत आम्ही हॉस्पिटलमध्ये पोहोचलो.तोवर उजवा पाय पूर्ण आखडून गेला होता. मला स्ट्रेचरवरूनच आत न्यावं लागलं.

अँटिव्हेनम देण्याआधी त्याची टेस्ट करावी लागते.त्यानुसार टेस्ट डोस देऊन अर्ध्या-पाऊण तासाने इंजक्शन दिलं गेलं. डॉ.फडणीस सोबत होतेच.अण्णाही सतत फोनवर होता.थोड्या वेळात आमचा मित्र डॉ.अमित कामतही दाखल झाला.'सर,काळजी करू नका सर्व काही ठीक होईल.मी आता तुमच्यासोबतच थांबणार आहे', असं त्याने म्हटल्यामुळे मी खरोखरच शांत झालो.

अजूनही माझं रक्ताभिसरण,हृदयक्रिया आणि मूत्रपिंडाचं कार्य सगळं व्यवस्थित चालू होतं.ते पाहून डॉ.फडणीस म्हणाले "विषाचा परिणाम आता म्हणावा तसा राहिलेला नाही.धोका टळलेला दिसतोय.पण तरी पुढच्या अड्डेचाळीस तासांसाठी कीप युवर फिंगर्स क्रॉस्ड !"

अड्ठेचाळीस तासही उलटले.मी त्या सर्पदंशातून सुखरूप बचावलो.साप हाताळण्याचा इतक्या वर्षांचा अनुभव असला तरी प्रत्येक प्रसंगातून काही तरी शिकता येतं.कारण कितीही सावधगिरी बाळगली तरी सर्पदंशाला सामोरं जावं लागू शकतं.मग तुम्ही साप हाताळत असा किंवा नसा.पण तशी वेळ आली,तर

मानसिक संतुलन बिघडू न देता शांत राहणं महत्त्वाचं असतं.वेळ न दवडता हॉस्पिटलमध्ये जाणं अत्यावश्यक असतं.त्या दिवशी गुडघ्याच्या वाटीऐवजी आजूबाजूला दुसऱ्या विषदंताचा दंश झाला असता तर माझ्या शरीरात दुप्पट विष भिनलं असतं.नाग आणि मण्यार यांचं विष मज्जासंस्थेवर परिणाम करणारं असतं,तर घोणस आणि फुरसं यांचं विष शरीरातील रक्ताभिसरणावर परिणाम करतं.निसर्गप्रेमींच्या,पशू-पक्षी-प्राणी आणि सर्पमित्रांच्या जागरुकतेमुळे वन्य-जीवांचं संरक्षण मोठ्या प्रमाणात होत आहे.पण त्याचबरोबर वन्य जीव हाताळताना त्यांनीही खूपच सावधगिरी बाळगण्याची गरज असते. माझ्याच उदाहरणावरून मी हे नक्की सांगू शकतो. "

●●● समाप्त ●●●

5/25/26

निष्क्रिय कालावधी (हायबरनेशन) / Inactive period (hibernation)

उन्हाळा संपत आला आहे आणि जंगलाचा रागरंग जरा अजब आहे.झाडांचा गर्द हिरवा डेरा आता फिकट पिवळा होत चालला आहे.झाड दमलेलं जाणवतं.ते थकलेलं झाड हा तणावपूर्ण मोसम संपण्याची वाट पाहात आहे.खूप दमछाक झालेल्या दिवशी आपण जसे आराम करायची संधी शोधतो,तीच अवस्था आता झाडांची असते.

ग्रिझ्ली अस्वल आणि डोरमाऊस हे दोन्ही प्राणी निष्क्रिय अवस्थेत झोपून राहतात. रात्रभर पार्टी करून घरी आल्यावर आपली जी अवस्था होते, तसं तर त्यांचं होत नसेल? याची तुलना ग्रिझ्ली अस्वलाशी करता येईल.हा प्राणी झाडांप्रमाणेच आपले धोरण ठेवतो. उन्हाळाभर भरपूर खाऊन तो शरीरावर चरबीचा जाड थर चढवतो,

यामुळे हिवाळा सुसह्य होऊ शकतो.झाडे पण अगदी असंच करतात.अर्थात त्यासाठी त्यांना ब्लूबेरी फळ किंवा सालमन मासा खावा लागत नाही.त्यासाठी त्यांना फक्त सूर्याकडून ऊर्जा घ्यावी लागते आणि त्यापासून साखर व इतर गोष्टी बनवून ठेवाव्या लागतात.

अस्वलासारखेच ते आपल्या सालाखाली याचा साठा करतात.पण ते लठ्ठ होत नाहीत,मात्र त्यांच्या हाडांची,म्हणजे लाकडाची वाढ होते.तयार झालेले अन्न आपल्या ऊतींमध्ये साठवलं जातं.अस्वल जे मिळेल ते खात सुटतं,पण झाडांना मात्र एका मर्यादेपर्यंतच अन्न घेता येतं.

द हिडन लाईफ ऑफ ट्रीज

पी ट र वो ह्ल ले बे न

अनुवाद - गुरुदास नूलकर

अरविंद घनश्याम पाटकर

 मनोविकास प्रकाशन

ऑगस्ट महिन्यानंतर रानटी चेरी,बर्ड चेरी किंवा रानटी सेवा देणाऱ्या झाडांकडे बघून तुम्हाला हे स्पष्ट दिसेल. ऑक्टोबरपूर्वी अनेक दिवस भरपूर ऊन असले तरीही ते आता लाल होण्यास सुरुवात होते.याचा अर्थ आता त्यांचे दुकान वर्षाअखेरीपर्यंत बंद राहणार. सालाखालची जागा आणि मुळं आता अन्नसाठ्याने भरून गेलेली असतात.

अधिक साखर बनवली तर ती साठवण्यासाठी आता जागा नाही.यानंतरच्या काळात अस्वलं जरी खात राहिली तरी झाडांना आता निद्राअवस्थेत नेण्यासाठी सँडमॅन आलेला असतो.

या झाडांव्यतिरिक्त इतर बहुतांश झाडांना अन्नसाठा करण्यासाठी अधिक जागा उपलब्ध असते.त्यामुळे ते प्रकाश संश्लेषण चालू ठेवून बर्फ सुरू होईपर्यंत अन्नसाठा करत राहतात.त्यानंतर मात्र त्यांना सर्व काम बंद ठेवावे लागते.याचं एक कारण म्हणजे पाणी. झाडाचे 'रक्त'च गोठले तर काहीच करता येत नाही आणि परिस्थिती बिकट होऊ लागते.हिमवृष्टी सुरू झाल्यावर जर लाकडात खूप पाणी शिल्लक असेल तर गोठलेल्या नळासारखं ते फुटू शकतं.आणि म्हणूनच अनेक प्रजाती स्वतःच्या लाकडातून आर्द्रता कमी करू लागतात.हे साधारण जुलै महिन्यात सुरू होतं.

पण असं करूनही झाडं हिवाळ्यासाठी तयार झालेली नसतात,त्याला दोन कारणे आहेत.पहिलं कारण म्हणजे,चेरीच्या कुळातली झाडं सोडून इतर प्रजाती उन्हाळ्याचे शेवटचे दिवस ऊर्जा साठवण्यासाठी वापरतात.आणि दुसरं कारण म्हणजे अनेक प्रजातींचं एक काम बाकी असतं,ते म्हणजे ऊर्जेचा साठा पानाकडून खोड आणि मुळांकडे नेऊन ठेवणं.आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे त्यांना अजून आपल्या हिरव्या रंगाच्या क्लोरोफिलचे विभाजन करून ठेवणं बाकी असतं.असं केलं तरच त्यांना येत्या वसंत ऋतूमध्ये नवीन पालवीला क्लोरोफिल वाटप करता येणार असतं. पानातून हिरवा रंगद्रव्य गेला की आधीपासून असलेले पिवळे आणि तपकिरी रंग पानावर चढतात.कॅरोटीनने बनलेले हे रंग बहुतेक संकटात असल्याची घोषणा जाहीर करत असावेत.आता याच सुमारास अफिड आणि इतर कीटक खोडांमध्ये भेगा शोधू लागतात. येणाऱ्या थंडीपासून तिथेच त्यांना सुरक्षा मिळणार असते.सशक्त झाड आपल्या उत्तम तब्येतीची जाहिरात करण्यासाठी उजळ रंगाची पानगळीची पालवी धरतात. अफिड आणि इतर कीटकांना हा संदेश बरोबर समजतो.सशक्त झाडे अधिक विषारी द्रव्य बनवू शकतात ज्यामुळे त्यांच्या पिल्लांना धोका निर्माण होतो. आणि म्हणून हे कीटक आकर्षक न दिसणाऱ्या झाडांच्या शोधात असतात.

पण एवढी उधळपट्टी कशाला करायची? हीच गोष्ट वेगळ्या रितीने हाताळता येते,हे काही सूचीपर्णी झाडे दाखवून देतात.दरवर्षी नवीन पालवी धरण्यापेक्षा ते आपली हिरवी पालवी तशीच ठेवतात.आणि ही सूचीपर्णी पानं थंडीमध्ये गोठू नये यासाठी एक विशिष्ट द्रव्य त्यात सोडलं जातं.तसेच पानातून बाष्पोत्सर्जन रोखण्यासाठी त्यांच्यावर मेणाचा थर चढवला जातो. अधिक सुरक्षा म्हणून पानाची कातडी टणक असते व श्वासोच्छ्वास करणारी छिद्रं खोल खालच्या बाजूला असतात.या सर्व सावधगिरीमुळे झाडातून फार पाणी बाहेर जात नाही.कारण पाण्याचा साठा संपला तर गोठलेल्या जमिनीवरून झाडाला पाणी घेणे शक्य नसते.झाड सुकून जाण्याची भीती असते.

पण सूचीपर्णी पानांपेक्षा रुंदपर्णी झाडाची पानं मऊ आणि नाजूक असतात,म्हणजेच त्यांना स्वसुरक्षा करण्याचं साधन नसतं.म्हणूनच बर्फाची चाहूल लागताच बीच आणि ओक वृक्ष लगेच पानझड करतात. मग या झाडांनी स्वतःच्या उत्क्रांतीत जाड कातडी आणि न गोठण्याची द्रव्यं का बरं तयार केली नसतील? वर्षानुवर्ष लाखो नवीन पानं तयार करून काही महिन्यातच ती झाडून टाकायची,यात फारसा शहाणपणा नाही.परंतु उत्क्रांतीच्या स्पर्धेत हा शहाणपणाच आहे,कारण दहा कोटी वर्षांपूर्वी पानझड वृक्ष पृथ्वीतलावर आले.पण सतरा कोटी वर्षांपासून सूचीपर्णी झाडं इथे आहेत. म्हणजे पानझडी वृक्ष तसे नवीनच. पानं झडून टाकणं हा खरोखरी शहाणपणा आहे कारण यामुळे हिवाळी वादळाच्या तडाख्यात हाडे वाचू शकतात.

ऑक्टोबर महिन्यात मध्य युरोपमध्ये येणाऱ्या या हिमवादळात झाडांना जिवंत राहण्याची कसरतच करावी लागते.ताशी साठ मैल वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यामध्ये मोठी मोठी झाडे उखडून पडतात.आणि काही वर्षे या वेगाचा वारा तर दर आठवड्यालाही येतो. पानझडीच्या काळात होणाऱ्या पावसामुळे जंगलाची जमीन चिखलमय होते आणि झाडांना पुरेसा आधार मिळत नाही.या वाऱ्यामुळे झाडाला सुमारे दोनशेवीस टन वजनाइतका जोरदार धक्का बसतो. ज्या झाडांना स्वतःचा बचाव करता येत नाही, ती वादळात उन्मळून पडून जातात. पण पानझडी वृक्ष मात्र बचाव करू शकतात. त्यासाठी ते आपली सौर ऊर्जा प्रक्रियेची साधनं झडून टाकतात. यामुळे सुमारे बाराशे चौरस यार्ड इतके क्षेत्रफळ झाडवरून नाहीसे होते आणि जंगलाच्या जमिनीवर पडते. हे एखाद्या शिडाच्या जहाजाचे एकशे तीस फूट उंचीचे शीड काढून टाकण्यासारखे आहे.पण इतकंच नव्हे,झाडांचं खोड आणि फांद्या अशा प्रकाराने वाढलेल्या असतात की त्यांच्यामुळे वाऱ्याला कमीत कमी अडथळा होतो.त्यांची रचना एखाद्या आधुनिक मोटार गाडीसारखीच असते. 

त्याउपर,पूर्ण झाड इतकं लवचीक असतं की वाऱ्याचा जोरदार तडाखासुद्धा त्यांना आपल्या शरीरात एकसारखा विभागून सहन करता येतो.अशा सर्व बचावयुक्तींमुळे झाडांना हिवाळ्यामध्ये तग धरता येते.पाच-दहा वर्षांमध्ये एकदा येणाऱ्या प्रचंड मोठ्या चक्रीवादळाला तोंड देताना जंगलातली सर्व झाडे एकमेकांच्या मदतीस उभी राहतात.प्रत्येक झाडाचा बांधा वेगळा असतो.प्रत्येकाच्या लाकडातील तंतू वेगळ्या पद्धतीचे असतात.म्हणजे वाऱ्याचा पहिली झोत आल्यावर प्रत्येक झाड एकाच दिशेला वाकणार असते पण पुन्हा सरळ होण्याचा प्रत्येकाचा वेग वेगळा असतो.पहिला झोत धोक्याचा नसतो.पण वाकडं झालेल्या झाडाला दुसऱ्या झोताचा धोका असतो. सशक्त जंगलामध्ये एका झाडाची दुसऱ्याला मदत होते. एक झाड वाकलेले राहिले तरी त्याच्यामागचे झाड पुन्हा सरळ होण्याच्या मार्गावर असते.यामुळे दोन्ही झाडांचे हलणे कमी होते.वाऱ्याचा पुढचा झोत यायच्या आत जंगलाची हालचाल अगदी संथ झालेली असते आणि पुन्हा वारं आणि झाडं यांच्यातील द्वंद्व चालू होते. झाडांचे डेरे मागेपुढे होताना पाहात बसावसं वाटतं. जंगल एकत्रितपणे मागेपुढे होताना दिसतेच,पण प्रत्येक झाडही हलत असल्याची जाणीव होते.वादळात जंगलामध्ये जाणे धोक्याचे आहे,हे मात्र लक्षात ठेवा.

आपण पुन्हा पानझडी कडे वळू.प्रचंड ऊर्जा खर्च करून दर वर्षी नवीन पालवी बनविण्यातच शहाणपणा आहे, याचा पुरावा म्हणजे प्रत्येक हिवाळ्यानंतर झाड जिवंत दिसते.पण याचे काही वेगळे धोकेही आहेत.हिमवृष्टी हा त्यातला एक धोका.बर्फापासून बचाव करण्यासाठी झाडे आपली पानं झडून टाकतात.मगाशी म्हटल्याप्रमाणे बाराशे चौरस यार्ड पाण्याचा पृष्ठभाग नाहीसा झाला की बहुतांश हिमवृष्टी जमिनीवर पडून जाते,थोडीशीच फांद्यांवर साचून राहते.याचा बर्फ झाला की वजन वाढते.

काही वर्षांपूर्वी पारा शून्य अंशाच्या खाली गेला आणि बर्फाची थोडीशी भुरभुर चालू झाली.असे हवामान तीन दिवस राहिले आणि प्रत्येक तासाला माझी जंगलाबद्दल चिंता वाढत गेली.पावसाची भुरभुर फांद्यांवर पडून त्याचा लगेच बर्फ होतो आणि फांद्यांना काही वेळातच ते वजनदार वाटू लागतं.मात्र हे दृश्य विलोभनीय असतं. सर्व झाडे स्फटिकाने सजवल्यासारखी दिसतात.बर्च वृक्षाची काही तरुण झाडे या वजनाने पार वाकून गेली होती.त्यांची मी आशाच सोडून दिली.आणि प्रौढ वृक्षांमध्ये डग्लस फर आणि पाईन या सूचीपर्णी वृक्षांच्या दोन तृतीयांश फांद्या बर्फाच्या वजनाने मोडून गेल्या होत्या.यामुळे ती झाडं अतिशय.अशक्त झाली होती.त्यांना आपला डेरा पुन्हा वाढविण्यासाठी काही दशकं लागणार होती.पण त्या तरुण वाकलेल्या बर्च झाडांचं मला जरा आश्चर्य वाटतं.

त्यांच्यावरचा बर्फ वितळून गेल्यावर सुमारे ९५ टक्के खोडं परत सरळसोट उभी राहिली.काही अर्थातच पुन्हा जागेवर आले नाहीआणि कालांतराने त्यांचं कुजलेलं खोड मोडून गेलं.आता जंगलाच्या मातीसाठी त्यांचा सेंद्रिय माल होत चालला आहे.

तर मग मध्य युरोपच्या अक्षांशांवर तग धरण्यासाठी पानझड हे एक प्रभावी तंत्र आहे असं म्हटलं पाहिजे. आणि यामुळे झाडांना आपला कचराही झडून टाकता येतो.झोपायच्या आधी आपण जसे स्वच्छतागृहात एक चक्कर मारून येतो,तसेच झाडांनाही झोपण्यापूर्वी नको असलेला कचरा टाकून द्यायचा असतो.

आणि हा कचरा पानझडीमधून जमिनीवर पडतो. पानझड करण्यासाठी ऊर्जा लागते,त्यामुळे ते संपल्याशिवाय झाडाला झोपी जाता येत नाही.एकदा का उपयुक्त द्रव्याचा सगळा साठा पानातून खोडाकडे वळवला की मग जाड ऊतींचा थर बनवून झाड त्या पानाचा फांदीशी असलेला संपर्क बंद करून टाकते. आता वाऱ्याची एक झुळूक जरी आली तरी पान गळून पडतं.सर्व पाने गळून गेली की मगच झाडाला विश्रांती मिळते.त्यांना विश्रांतीची नितांत गरज असते कारण आधीच्या मौसमात त्यांची दमछाक झालेली असते. झोप मिळाली नाही की जसा माणसांना त्रास होतो तसाच झाडांनाही होतो.निद्रानाशापासून जीवाला धोका उद्भवतो.आणि म्हणूनच जर आपण ओक किंवा बीचच्या झाडाला खोलीत वाढवायचा प्रयत्न केला तर ते मरून जातात.इथे त्यांना विश्रांती मिळत नाही आणि वर्षभरातच ते मरू शकतात.

मात्र आपल्या पालकांच्या सावलीत वाढणाऱ्या रोपट्यांची पानझड वेगळ्या प्रकारची असते.त्यांचे पालक जेव्हा पानझड करतात तेव्हा एकदम त्यांच्यापर्यंत भरपूर सूर्यप्रकाश पोचू लागतो.याचा फायदा घेऊन रोपटी ऊर्जा उत्पादनात गुंतून जातात. आणि मग पहिली हिमवृष्टी झाली की चकितच होतात. रात्रीचे तापमान २३ अंश फॅरनहाईटपेक्षा खाली गेले तर मात्र त्यांना जांभया देत निष्क्रिय पडून राहण्याशिवाय इलाज नसतो.आता पानझड करण्यासाठी ऊतींचे थर बनवून त्यांना बिलगून ठेवण्याची वेळ निघून गेलेली असते.आणि असं नाही केल तर पानझड शक्य नसते.ही रोपटी लहान असल्यामुळे त्यांना वाऱ्यापासून आणि बर्फापासून फारसा धोका संभवत नाही.

वसंत ऋतूमध्ये ही रोपटी अशीच अजून एक संधी साधतात.मोठ्या वृक्षांना पालवी फुटायच्या दोन आठवडे आधी त्यांची पालवी फुटते.यामुळेत्यांना भरपूर सूर्यप्रकाश घेता येतो.त्या रोपट्यांना हे कळतं कसं? आपल्या पालकांना पानफुटी कधी होणार याची तारीख काही त्यांना माहीत नसते.त्यांच्या आसपासची जमीन ऊबदार होऊ लागली की ही चाहूल त्यांना लागते. जंगलांतल्या जमिनीवर वसंतातली ऊब आधी पोहोचते. झाडांच्या डेरेदार वरच्या भागापेक्षा दोन आठवडे आधी! त्या उंचीवर दिवसा जोराचे वारे असतात आणि रात्री गारठते. त्यामुळे तिथे ऊब धरायला उशीर होतो.विशाल वृक्षांच्या डेरेदार सुरक्षाकवचामुळे जंगलातल्या जमिनीवर बर्फ कमीच पोहोचतो.त्याच बरोबर जमिनीवर पानगळीचा जाड थर विघटन होत असतो,

 त्यामुळेही जमीन उबदार राहते आणि जमिनीचा पारा वर चढायला मदत मिळते.शरद ऋतूमध्ये रोपट्यांना सूर्यप्रकाशाचा फायदा मिळालेले दिवस बघता,त्या तुलनेत यांना वसंत ऋतू सुरू होण्यावेळी एक पूर्ण महिना मुक्त वाढीसाठी मिळतो.म्हणजे त्यांच्या वाढीच्या काळात २० टक्क्यांची भर पडते.हे काही वाईट नाही ! पानझडी वृक्षांमध्ये काटकसरीने राहण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत.पानझडीच्या आधी बहुतांश प्रजाती पानांमधून ऊर्जा परत फांद्यांत आणून ठेवतात.पण काही प्रजाती याकडे दुर्लक्ष करतात.उदाहरणार्थ, अल्डर वृक्ष उद्याची चिंता न करता स्वतःची हिरवीगर्द पानं झडून टाकतात.पण ही प्रजाती जास्त करून पोषणयुक्त दलदलीच्या प्रदेशात वाढते,त्यामुळे त्यांना दरवर्षी नवीन क्लोरोफिल बनवणे जड नसते.त्यांच्या पायाशी वाढणारी बुरशी आणि सूक्ष्मजीव त्यांच्या पडलेल्या पानांचे विघटन करून झाडाला पोषणद्रव्य उपलब्ध करून देतात.

झाडाला फक्त हे मुळातून घेऊन पुन्हा नवीन क्लोरोफिल बनवायचे असते.नत्रच्या पुनरुज्जीवनाचीही त्यांना काळजी नसते,कारण मुळांवर असलेल्या गुठळ्यांत असणारे सूक्ष्मजीव सतत याचा पुरवठा करीत असतात.दर वर्षी एक चौरस मैलाच्या अल्डर वृक्षाच्या जंगलातून सुमारे ८७ टन नत्र हवेतून घेऊन त्याचा पुरवठा मित्र वृक्षांना केला जातो.बहुतांश शेतकरी जितके नत्र शेतात वापरतात त्यापेक्षा हे जास्त आहे.म्हणजे अनेक प्रजाती काटकसरीने राहतात त्याउलट अल्डर वृक्ष आपल्या संपत्तीचे प्रदर्शन करतात.अ‍ॅश आणि प्रौढ वृक्षही असेच वागतात.हे उधळे आपली हिरवी पानं झडू देतात आणि शरद ऋतूत विविध रंगाने नटणाऱ्या झाडांच्यात त्यांचा नंबर लागत नाही.तर मग स्वभावाने कंजुष असलेली झाडेच रंगबिरंगी असतात,असं दिसतंय.पण हे अर्धसत्य आहे. क्लोरोफिल काढून घेतल्यावर पानांवर पिवळा,केशरी आणि लाल रंग दिसू लागतो.पण हे रंग ज्यामुळे येतात ते कॅरोटिन आणि अ‍ॅन्थोसायनिन सुद्धा काही वेळातच विघटन होऊन बदलणार असतात.ओकचे वृक्ष मात्र अत्यंत सावधपणे सर्व द्रव्य काढून घेतात आणि फक्त तपकिरी पानं झडू देतात.म्हणजेच प्रत्येक झाड वेगळ्या पटीने खर्चीक असते.बीचची पाने तपकिरी आणि पिवळी झाली की झडतात पण आनंदी चेरी झाडांची पानं मात्र लाल असतानाच झडून जातात.

आता शेवटी सूचीपर्णी झाडांकडे वळू.त्यांच्याबद्दल मी फार बोललो नाही पण या गटात पानझडी वृक्षांसारखे पानगळ करणाऱ्या तीन प्रजाती आहेत लार्च,बाल्ड सायप्रस आणि डॉन रेडवूड.हे तिघे पानझडी वृक्षासारखे का वागतात, याची मला खरंच कल्पना नाही.कदाचित असंही असेल की उत्क्रांतीच्या शर्यतीत हिवाळ्यावर मात करण्याचा सर्वोत्तम मार्ग किती सावधगिरीने बाळगावी हे अजून निश्चित झालं नसावं.वसंत ऋतूमध्ये सूचीपर्णी पानं टिकवून ठेवणं हे नक्कीच फायद्याचं असतं.कारण नवीन पान उगवण्याची वाट न पाहता झाडाला आपली अन्नउत्पादनाची क्रिया लगेच चालू करता येते.पण वसंतातल्या उन्हाने अनेक नवीन कोवळे कोंब सुकून जातात जेव्हा मोठ्या झाडांचे वरचे डेरे वसंतातल्या उन्हाने छान गरम झालेले असतात.पण जमीन अजूनही थोडी गारठलेली असते.नवीन कोंब अशा वेळेस प्रकाश संश्लेषण सुरू करण्याची घाई करतात आणि सुकून जातात.त्यांना बाष्पोत्सर्जन थांबविता येत नसल्यामुळे धोक्याची चाहूल लागताच सूचीपर्णी पानं लुळी पडतात. विशेषतःगेल्या वर्षीच्या पानांचे असे होते,कारण त्यांच्यावर मेणाचा जाड थर नसतो.

या तिघांच्या व्यतिरिक्त स्प्रूस,पाईन,फर आणि डग्लस फर ही झाडंसुद्धा आपल्या सुया बदलतात, कारण त्यांना कचरा साफ करायचा असतो.सर्वांत जुन्या सुया ते प्रथम बदलतात कारण इजा होऊन त्यांची कार्यक्षमता कमी झालेली असते. जोपर्यंत ही झाडं सशक्त असतात तोपर्यंत फर दहा वर्षांसाठी, स्प्रूस सहा आणि पाईन तीन वर्षांसाठी आपल्या सूचीपर्णी पानांचा साठा करून ठेवतात.दोन फांद्यामधील वाढ होण्याच्या अंतराकडे पाहून हे लक्षात येते.पण पाईनची झाडं थंडीमध्ये विरळ दिसू लागतात, कारण ते एक चतुर्थांश पानं झडून टाकतात.वसंतात पुन्हा वर्षभर पुरतील इतक्या सुया वाढतात आणि झाडाची वाढ होते.आता मात्र झाड पुन्हा सशक्त दिसू लागते.

●●● समाप्त ●●●