* विजय गायकवाड | Vijay Gaikawad

live

नमस्कार आपले स्वागत आहे. मी पुस्तके आणि मित्रांवर पैसे खर्च करतो,माझ्याकडे दगड आणि विटांवर खर्च करण्यासाठी पैसे नाहीत.- रस्किन बाँड.ही थोर माणसं व त्यांचे विचार मला पुस्तकात भेटलीत.ती भेटली आणि त्यांनी सांगितले कि, प्रत्येक दिवशी असं काही तरी करा की,ते तुम्हाला अधिक सुंदर उद्याच्या दिशेने खूप लांबवर घेऊन जाईल."- डोग फायरबाऊ.' सर्वियन कादंबरीकार मिलोराद पावीच यांचे एक वाक्य आहे ते म्हणतात - जोवर जगात पुस्तक वाचणाऱ्या वाचकांची संख्या बंदूकधारी सैनिका पेक्षा अधिक आहे तोवर काळजीच काहीच कारण नाही.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात.पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये.म्हणून अविरतपणे प्रयत्न करणारे मार्गदर्शक, मित्र धावून येतात.प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,डॉ.दीपक शेटे,आ.भरत बुटाले,प्रा.सर्जेराव राऊत,सुभाष ढगे,अनिल फारणे,डॉ.सुधीर सरवदे ,विश्वास खाडे, विनायक पाटील,संजय कुंभार,सतीश खाडे,मनोहर सुर्वे,गणेश खंदारे,तात्या गाडेकर, दादासाहेब गाडेकर, दादासाहेब ताजणे, पुस्तकातील घटना प्रसंग सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील यांनी केलेले आहे. मला लिहिण्याची प्रेरणा देणारी पुस्तके,लेखक,प्रकाशक,मित्र ही जगावेगळी माणसं माझ्या जीवनातील महत्वाचा टप्पा आहेत.... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ.मेघा गायकवाड, चिरंजीव मयान,माझ्या धावण्यातील गुरुवर्य नामदेव बरुरे,लुल्ला शेख मोठी ताई ,लहान ताई जयश्री शिंदे या सर्वांचेच मनापासून आभार व धन्यवाद मॅट्रिक फेल विजय गायकवाड

8/18/26

अदृश्य पाचर — The Invisible Wedge | भाग १

एखाद्या आण्विक प्रक्रियांच्या साखळीप्रमाणे स्फोटकपणे कार्य करीत दुसऱ्या लाटेने आजवर एक असलेली जीवनाची दोन अंगे फोडून बाजूला केली. असे करीत असताना तिने आपल्या अर्थकारणात, आपल्या मानसात, फार काय, आपल्या लैंगिक व्यक्तित्वातही एक फार मोठी अदृश्य पाचर ठोकून ठेवली.

औद्योगिक क्रांतीने एका अप्रतिमपणे एकसंध असलेला असा समाज आपल्या वैशिष्ट्यपूर्ण तंत्रज्ञानाद्वारे, आपल्या खास सामाजिक संस्थांद्वारे आणि आपल्या माहिती पद्धतींद्वारे कार्य करीत निर्माण केला. परंतु दुसऱ्या पातळीवर तिने आर्थिक तणाव, सामाजिक संघर्ष आणि मानसशास्त्रीय कासावीस यांनी ठासून भरलेली जीवनपद्धती निर्माण करून समाजाच्या अस्तरातील ऐक्य टरकावून बाजूला केले.

आपल्याला दुसऱ्या लाटेच्या युगामध्ये या अदृश्य पाचरीने आपले जीवन कसे घडवले हे समजले, की आकार घेत असलेल्या तिसऱ्या लाटेच्या आघाताच्या आवेगाचे आकलन होऊ शकेल.

मानवी जीवनाचे ह्या दुसऱ्या लाटेने केलेले दोन विभाग म्हणजे उत्पादन आणि वापर, विनियोग.

उदाहरणार्थ, आपल्याला नेहमी वाटत असते की आपण उत्पादक आहोत, तसेच ग्राहकही आहोत. परंतु नेहमी हे खरे असत नाही. औद्योगिक क्रांतीच्या अगोदर मानवाने निर्माण केलेले विपुल अन्नधान्य, तयार केलेल्या वस्तू आणि सेवा या गोष्टी खुद्द उत्पादक आणि त्यांच्या कुटुंबियांकडूनच वापरल्या जात होत्या किंवा श्रेष्ठ लोकांचा वर्ग या गोष्टींचा अवशेष स्वतःच्या वापरासाठी बळकावत असे.

बहुतेक शेतीप्रधान समाजात लोकांचा फार मोठा वर्ग शेती करत होता. छोट्या आणि काहीशा एकाकी गटांतून राहत होता. हे लोक गरजेपुरतेच अन्न निर्माण करत होते, स्वतःला जिवंत ठेवण्यात यश मिळवत होते. आपल्या जमीनदाराला खूश ठेवण्यातही यश मिळवत होते.

कितीतरी काळ अन्नधान्य साठवणीच्या सुविधा त्यांच्याकडे नव्हत्या. आपले उत्पादन बाजारापर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांच्याकडे रस्ते नव्हते. त्यांना माहीत होते की जास्त उत्पादन केले, तर सरंजामदार किंवा गुलामांचे मालक ते आपले हडप करतील. त्यामुळे आपले उत्पादनतंत्र सुधारण्याच्या किंवा उत्पादन वाढवण्याच्या बाबतीत ते उदासीन होते.

अर्थात् व्यापार तेव्हाही होता. आपल्याला माहीत आहेच, की काही धाडसी व्यापारी उंट, गाडी किंवा नौका यांच्यावर आपला माल लावून हजारो मैल तो नेत होते. ग्रामीण भागातून येणाऱ्या अन्नधान्यावर अवलंबून असलेली शहरे निर्माण होत.

इ. स. १५१९ मध्ये मेक्सिकोत पोहोचणाऱ्या स्पेनवासियांना स्टॅटेलोल्कोमध्ये हजारो लोक रत्ने, मौल्यवान धातू, गुलाम, सॅन्डल्स, कापड, चॉकलेट, दोर, कातडी, टर्की, भाजीपाला, ससे, कुत्री आणि हजारो प्रकारची मातीची भांडी यांची खरेदी-विक्री करत असलेले पाहून आश्चर्याचा धक्का बसला.

जर्मन बँकर्ससाठी निघालेल्या १६व्या व १७व्या शतकातील खाजगी वितरणातील वृत्तांत, दि फुग्गर न्यूज लेटर, त्या काळच्या व्यापाराचे विविधरंगी स्वरूप दाखवितो. भारतातील कोचीनमधील एका पत्रात युरोपात पाठविण्यासाठी मिरी खरेदी करायला पाच जहाजे घेऊन आलेल्या एका युरोपीय व्यापाऱ्यावर चाललेल्या खटल्याची सविस्तर हकीकत आली आहे.

तो म्हणतो, की, “मिरीचा व्यापार हा एक उत्तम धंदा आहे; फक्त त्यासाठी उत्साह आणि चिकाटी यांची आवश्यकता आहे.”

हा व्यापारी लवंगा, वेलदोडे, जायफळ, जायपत्री, कणिक, काही औषधे युरोपीय बाजारात नेत असे.

तरीदेखील, शेतीमजुरांनी ताबडतोबीच्या स्वतःच्या वापरासाठी केलेल्या उत्पादनाच्या प्रमाणात हा व्यापार म्हणजे एका तत्त्वाचे केवळ चिन्हच म्हणावे लागेल.

सोळाव्या शतकाच्या उत्तरार्धापर्यंत भूमध्य सागरीय विभागात एका टोकाला स्पेन आणि फ्रान्स व दुसऱ्या टोकाला तुर्कस्तान असलेल्या प्रदेशात ६० ते ७० दशलक्ष लोक राहत होते. या लोकसंख्येच्या नव्वद टक्के लोक जमिनीतून येणाऱ्या उत्पादनावर जगत होते. व्यापारयोग्य वस्तूंचे फार थोड्या प्रमाणात उत्पादन होत होते, असे या कालखंडातील इतिहासाचे निर्विवाद निष्कर्ष काढणारे संशोधक फर्नाँ ब्रॉडेल यांचे म्हणणे आहे.

ते आणखी म्हणतात, “भूमध्य सागरीय भागातील एकूण उत्पादनाच्या साठे किंवा सत्तर टक्के उत्पादन बाजारीय अर्थक्षेत्रात कधी आलेच नाही.”

या क्षेत्रातली ही स्थिती, तर उत्तर युरोपातली काय असेल? खडकाळ जमीन आणि अतिथंड दीर्घ हिवाळे, तिथल्या जमिनीतून शेतकऱ्यांना कितीसे उत्पादन काढू देत असतील? आणि तेही किती कष्टाने!

औद्योगिक क्रांतीच्या पूर्वीच्या पहिल्या लाटेच्या आर्थिक स्थितीचे आपल्याला जर नीट आकलन झाले, तर दोन वेगळे भाग धारण करणाऱ्या तिसऱ्या लाटेचे आकलन सोपे होईल.

‘अ’ विभागात लोक स्वतःच्या उपयोगासाठी उत्पादन काढीत असत, तर ‘ब’ विभागाचे लोक उत्पादन, व्यापार किंवा वस्तूंची अदलाबदल करून करावयाच्या खरेदी-विक्रीसाठी करत असत.

‘अ’ विभाग खूप विस्तृत होता. बहुतांश लोकांसाठी उत्पादन आणि वापर या गोष्टी एका जीवनदायी प्रक्रियेत एकत्र गुंफलेल्या अवस्थेत होत्या. ही एकात्मता इतकी पक्की होती, की ग्रीक, रोमन आणि मध्ययुगीन युरोपीय दोहोंतला फरक करत नव्हते. एवढेच नव्हे, तर ‘ग्राहक’ हा शब्दही त्यांच्या भाषेत नव्हता.

पहिल्या लाटेच्या संपूर्ण युगात लोकसंख्येचा अगदीच लहान भाग बाजारावर अवलंबून होता. बहुतेक लोक त्याच्या बाहेरच असत.

दुसऱ्या लाटेने झटक्यात ही स्थिती बदलून टाकली.

अत्यंत स्वयंपूर्ण लोक किंवा समाज यांच्या जागी तिने इतिहासात पहिल्यांदाच अशी स्थिती निर्माण केली, की मोठ्या प्रमाणातील संपूर्ण, सर्व प्रकारचे अन्नधान्य, वस्तू आणि सेवा या विक्री, अदलाबदल आणि देवाण-घेवाण यांच्या कक्षेत गेल्या.

खुद्द स्वतःच्या किंवा कुटुंबाच्या वापराच्या वस्तू निर्माण करण्याची पूर्वीची कल्पनाच तिने पूर्णतः नाहीशी करून टाकली. आणि अशी एक वेगळीच संस्कृती निर्माण केली, की जिच्यात कोणीही, अगदी शेतकरीदेखील, इथून पुढे कधीच स्वयंपूर्ण होऊ शकणार नाही.

अन्न, वस्तू आणि सेवा यांच्या बाबतीत प्रत्येकजण पूर्णतः दुसऱ्या कोणावर तरी अवलंबून राहण्याची वेळ आली.

थोडक्यात, औद्योगिकीकरणाने उत्पादन आणि वापर यांची एकी फोडली. उत्पादकापासून ग्राहक वेगळे फोडले. पहिल्या लाटेची एकसूनी अर्थव्यवस्था ही दुसऱ्या लाटेत भेगाळलेली अर्थव्यवस्था बनून गेली.

बाजाराचा अर्थ

या पद्धतीचे परिणाम महत्त्वाचे ठरले. तरी आपल्याला ते क्वचितच समजतात.

एकेकाळी एक छोटे किंवा वर्तुळाबाहेरचे ठरेल असे बाजार हे तत्त्व म्हणजे जीवन झपाटून टाकणारे एक झंझावाती वादळ बनून राहिले आहे. अर्थकारण ‘बाजारी’ बनून गेले. आणि ही गोष्ट समाजवादी व भांडवलवादी दोन्ही प्रकारच्या औद्योगिक अर्थकारणाच्या बाबतीत घडली.

पाश्चात्त्य अर्थशास्त्रज्ञांचा कल, बाजार ही जीवनाची पूर्णतः भांडवलशाही बाब आहे असे मानण्याचा आहे. त्यातूनही हा शब्द ते ‘फायद्याचे अर्थशास्त्र’ याचा समानार्थी म्हणून वापरतात.

तरीदेखील इतिहासाच्या अभ्यासाने आपल्याला हे कळते, की देवाण-घेवाण म्हणजेच बाजाराची जागाही फायद्याच्या अगोदर, त्याच्याहून स्वतंत्रपणे अस्तित्वात आली होती.

कारण स्पष्टच सांगावयाचे तर बाजार म्हणजे देवाण-घेवाणीचे जाळे. जणू तो एक स्विचबोर्डच. त्याच्यामार्फत वस्तू वा सेवा संदेशांप्रमाणे त्यांच्या योग्य स्थळी नेऊन पोहोचवतो. तो काही मुळात भांडवलशाही नाही.

असा स्विचबोर्ड फायद्याच्या उद्दिष्टाने प्रेरित झालेल्या औद्योगिकतेला जसा आवश्यक आहे, तसाच समाजवादी औद्योगिक समाजासाठीही आवश्यक आहे.

थोडक्यात, जिथे म्हणून दुसऱ्या लाटेने प्रभाव पाडला, तिथे उत्पादनांचे उद्दिष्ट वापरापेक्षा अदलाबदल हे ठरले. आणि ही अदलाबदल अमलात येण्यासाठी यंत्रणेची आवश्यकता होती. बाजाराची आवश्यकता होती.

बाजार उदासीन, अक्रियाशील असून उपयोग नव्हता. अर्थशास्त्रीय इतिहासाचे अभ्यासक कार्ल पोलान्यी यांनी असे दाखवून दिले आहे, की पूर्वी जो बाजार समाजांच्या सामाजिक किंवा आर्थिक, सांस्कृतिक उद्दिष्टांपुढे गौण ठरला होता, तोच नंतर औद्योगिक समाजांचे प्रमुख उद्दिष्ट ठरला.

पुष्कळ लोक चलन-मूल्यांकन प्रणालीत खेचले गेले. व्यापारी मूल्ये केंद्रस्थानी आली. सरकारे समाजवादी असोत की भांडवलवादी, त्यांचे मुख्य उद्दिष्ट ठरले—आर्थिक भरभराट.

कारण बाजार ही एक विस्तार पावणारी, स्वतःला मजबूत ठेवू शकणारी संस्था होती. अगदी सुरुवातीच्या श्रमविभागणीने व्यापाराला प्रोत्साहन दिले होते, त्याप्रमाणे आता बाजाराचे केवळ अस्तित्वच उलट अधिक श्रमविभागणीला प्रोत्साहन देऊ लागले. आणि त्यायोगे उत्पादकतेत प्रचंड वाढ झाली.

स्वतःच विस्तृत पावणारी एक प्रक्रिया कार्यान्वित झालेली होती.

बाजाराचा हा स्फोटक विस्तार जगाच्या ध्यानीमनी नसतील अशा राहणीमानाच्या उंचीला वेगाने उंचावण्याला साहाय्यभूत ठरला.

राजकारणात मात्र उत्पादन आणि वापर यांच्या भेदातून निर्माण झालेल्या नवीनच प्रकारच्या संघर्षामुळे दुसऱ्या लाटेतील सरकारे अधिकाधिक व्यथित होत गेलेली आढळली.

मार्क्सवाद्यांनी वर्गकलहावर जो भर दिला, त्यामुळे उत्पादकांच्या—कामगार व व्यवस्थापक दोघांच्याही—अधिक पगाराच्या, अधिक फायद्याच्या आणि अधिक नफ्याच्या मागण्यांमध्ये आणि ग्राहकांच्या [यात खुद्द तेच लोकही असतात] कमी दरांच्या मागण्यांमध्ये उद्भवलेला अधिक मोठा, अधिक खोल संघर्ष झाकून गेला.

आर्थिक धोरणाचा काटा दोन्ही तरफेच्या या टेकूवरच झुलत राहिला.

अमेरिकन संयुक्त संस्थानात झालेली ग्राहक चळवळीची वाढ, नुकत्याच सरकारने कमी केलेल्या किमतींच्या वाढीविरुद्ध झालेल्या उठावांमध्ये, ब्रिटनमध्ये अखंड चालू असलेले दरांबाबतचे आणि मिळकतीबाबतचे वादंग, ग्राहकोपयोगी वस्तूंना की अवजड उद्योगांना प्राधान्यक्रम याविषयीच्या वादाच्या पायाभूत कल्पनांना धरून रशियात चाललेले भीषण झगडे—ह्या सर्व गोष्टी म्हणजे, भांडवलशाही असो की समाजवादी असो, प्रत्येक समाजात उत्पादन आणि वापर यांच्यातल्या फुटीमुळे उत्पन्न झालेल्या मूळ संघर्षाची अंगे आहेत.

केवळ राजकारणातच नाही, तर सांस्कृतिक क्षेत्रातही फरक पडला.

ह्या फाटाफुटीमुळे इतिहासात पहिल्यांदाच पैशांचाच विचार करणारी, लोभी, व्यापारीभूत आणि हिशोबी संस्कृती निर्माण झाली.

दि कम्युनिस्ट मॅनिफेस्टोने नव्या समाजावर केलेल्या आरोपांशी सहमत होण्याला एखादा माणूस मार्क्सवादीच असावा लागतो असे नाही.

“माणसामाणसांत दुवा उरला आहे तो निर्लज्ज स्वार्थीपणाचा, निब्बर ‘रोख फेडणुकीचा’. व्यक्तिगत संबंध, कौटुंबिक बंध, प्रेम, मैत्री, शेजाऱ्यांचे किंवा सामाजिक बंध या सर्व गोष्टी बाजारू स्वार्थात विरघळून गेल्या आहेत; या गोष्टी बाजारू स्वार्थाने भ्रष्ट केल्या आहेत.”

मार्क्सने माणसांच्या ऋणानुबंधात निर्माण झालेला हा अमानुषपणा अचूक ओळखला. पण त्याला त्याने भांडवलशाहीच्या माथी मारले, हे मात्र चूक होते. अर्थात, त्याने हे जेव्हा लिहिले, तेव्हा त्याकाळी त्याला औद्योगिक समाज भांडवलशाही स्वरूपातच दिसला असला पाहिजे.

आता, अर्धशतकाहून अधिक काळ समाजवादावर आधारलेल्या औद्योगिक समाजाचा अनुभव घेतल्यानंतर आपल्याला हे समजून चुकले आहे की, हावरटपणा, व्यापारातील भ्रष्टाचार आणि माणसामाणसांतील ऋणानुबंधातील घट या गोष्टींचा शुद्ध आर्थिक तत्त्वांवर विचार करता त्या काही केवळ भांडवलशाहीच्या मक्त्यातील नव्हेत.

पैसा, वस्तू, पदार्थ यांच्यात असलेला व्यापक विचार पाहता त्यांच्यात भांडवलशाही किंवा समाजवाद यांच्यापेक्षा औद्योगिकीकरणाचेच प्रतिबिंब पडलेले आढळून येईल.

सर्व समाजांमध्ये बाजाराकडे आलेली मध्यवर्ती भूमिका, जिच्यात उत्पादनाची वापराशी फारकत झालेली आहे, जिच्यात प्रत्येक जण आपल्यात असलेल्या जीवनोपयोगी वस्तूंच्या उत्पादनकौशल्यापेक्षा बाजारावरच अवलंबून आहे, तिचे हे प्रतिबिंब आहे.

राजकीय रचना कोणतीही असो, अशा समाजात केवळ वस्तूच आणल्या, विकल्या किंवा बदलल्या जात नाहीत, तर श्रम, कल्पनाशक्ती, कला आणि फार काय, आत्म्यांचाही व्यापार होत असतो!

बेकायदेशीर कमिशन खिशात टाकणारा पाश्चात्त्य एजंट, साहित्य पसंत केल्याबद्दल लेखकाकडूनच उलट काही स्वीकारणारा रशियन संपादक किंवा अगोदरच कामाचा मोबदला असूनही व्होडकाच्या बाटलीची (जादा) मागणी करणारा प्लंबर—हे सगळे एकाच माळेचे मणी.

केवळ पैशांसाठी लिहिणाऱ्या फ्रेंच किंवा अमेरिकन किंवा ब्रिटिश कलाकारांहून, पोलिश, झेक किंवा रशियन कादंबरीकार, चित्रकार किंवा नाटककार वेगळे नाहीत. कारण तेही बोनस, किंवा नव्या गाडीच्या प्राप्तीसाठी प्राधान्य, किंवा इतर अप्राप्य गोष्टी अशा जादा अधिक लाभासाठी आपली कला विकत असतात.

अपुर्ण शिल्लक भाग २ पुढील लेखामध्ये.

📖 स्रोत : तिसरी लाट — Alvin Toffler यांच्या The Third Wave या पुस्तकाचा मराठी अनुवाद.
अनुवादिका : शरदिनी मोहिते
प्रकाशक : महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई

 


8/16/26

दाखवण्यापुरती आधुनिकता Modernity for Show — भाग २

१९९५ मध्ये ‘गणपती दूध पितो’ या अफवेने काही क्षणांत देश आणि नंतर जगास पादाक्रांत केले. आता तर सामाजिक माध्यमांमुळे (समाजशास्त्रज्ञ त्यांना अ-सामाजिक म्हणतात) अफवांचा प्रसार अतिशय सुलभ व वेगवान झाला आहे. ‘येशू ख्रिस्ताच्या क्रूसावरून रक्त ओघळत आहे’, ‘माता मेरीच्या डोळ्यांतून अश्रू वाहत आहेत’, ‘येशू येणार आहे’ अशा अफवा मेक्सिको, पेरू, दक्षिण युरोपात वारंवार उठत असतात.

यासंबंधी गुप्ता म्हणतात, ‘चमत्कारास पडताळून पाहण्याची तसदी न घेतल्याने काही समाजात सहजगत्या अफवा खूप वेगाने पसरतात. बहुजातीय व विखंडित समाज नेहमीच अफवाप्रवण असतो.’

सरकारी कामकाजात, दैनंदिन व्यवहारात समाजातील बहुसंख्यांना अजिबात स्थान नसते. शासकीय यंत्रणेवर पूर्ण अविश्वास असतो. ‘आपल्यामधील’ कुणीतरी छातीठोकपणे सांगत असल्यास सहज खात्री पटते. श्रृंखला अभिक्रियेप्रमाणे कमालीच्या वेगाने बातमी पसरत जाते. ती कधी चमत्काराची असते, तर कधी आपल्यावर अन्याय वा अत्याचार झाल्याची असते. त्यातून जातीय व धार्मिक दंगे उसळतात.

१९९५ मध्ये ‘गणपती दूध पितो’ या अफवेने काही क्षणांत देश आणि नंतर जगास पादाक्रांत केले. आता तर सामाजिक माध्यमांमुळे अफवांचा प्रसार अतिशय सुलभ व वेगवान झाला आहे.

मागील ३० वर्षांत ग्रामीण भाग झपाट्याने बदलत चालला आहे. १९५०च्या दशकात जमीन सुधारणा कायद्याला जमले नाही, ते घरातील वाटण्यांमुळे होत गेले आहे. देशातील सरासरी जमीनधारणा दोन एकरांवर आली आहे.

भूमिहीन हे मजुरीसाठी केवळ शेतकामावर अवलंबून नाहीत. ते जवळच्या शहरातील बांधकामे, वाहतूक व मिळेल त्या कामासाठी कधीच निघून गेले. गावातील जातीय द्वेष शहरात जाणवत नाही. शहरातील ओळख ही जातीवर आधारित नसते. उत्तम मजुरीसाठी (तसेच वैयक्तिक अपमान टाळण्यासाठी) शहराकडे जाण्याचा ओघ अखंड आहे.

१९७० पर्यंत भूमिहीन व अल्पभूधारकांची जागरूकता व्यक्त होत असे. त्यांच्या मागण्यांसाठी ते आक्रमक होत असत. आता उत्पादक शेतकरी सक्रिय झाले आहेत. ग्रामीण अर्थकारणातून शेतमजूर बाजूला पडला आहे. त्यामुळे मागण्यांचे स्वरूपदेखील बदलले आहे.

किमान वेतन, जमीन सुधारणा वा जमिनीच्या हक्कासाठी आता आंदोलने होत नाहीत, तर अनुदान, कर्जमाफी, वीजदर माफी, शेतमालाचे भाव या मागण्या देशभरातून येत आहेत. बडा जमीनदार, सावकार अथवा सरकारी अधिकारी हे आता गौण झाले असून, जिल्हा प्रशासन, राज्य सरकार अथवा केंद्र सरकारशी त्यांचा लढा आहे.

जातिव्यवस्था मरणपंथाला लागली असली, तरीही जातीची ओळख अजूनही जाता जात नाही. कायद्याने धर्मशास्त्राची जातीची उतरंड हद्दपार केली असली, तरी मनातील उच्चनीचता जात नाही.

एकगठ्ठा मत मिळवण्याकरिता आणि जातीच्या नावावर संघटना करून सवलती, मागण्या, लाभप्राप्तीसाठी जातीची महती टिकून आहे.

प्रो. गुप्ता म्हणतात, ‘काळाच्या गरजेनुसार जातींची आघाडी केली जाते. या ‘समाज’कारणाच्या पाठीमागे जातीचे राजकारण असते. खाम (क्षत्रिय, हरिजन, अहिर व मुस्लीम), कधी अजगर (अहिर, जाट, गुजर व रजपूत), कधी माधव (माळी, धनगर व वंजारी) युत्यांच्या प्रयत्नात नेते असतात. या जातीय युत्यांना पुरोगामी व निधर्मी असल्याचे प्रमाणपत्र ‘निवडणूक पंडित’ बहाल करत असतात.

जातीच्याच आधारावर उमेदवार ठरवले जातात. जात या एकमेव निकषावर मते टाकली जातात, असा भ्रम माध्यम व राजकीय क्षेत्रातील बहुसंख्यांना आहे. वास्तव मात्र तसे नाही.

उत्तर प्रदेशातील सीतापूर, घोसी, खेडी, हरदोई या लोकसभा मतदारसंघांत मागासवर्गीयांची संख्या अधिक असूनही १९९८-९९ मध्ये बहुजन समाज पार्टीला जागा जिंकता आल्या नाहीत. यादव जातीचे बाहुल्य असलेले आझमगड, सैदपूर, गाझीपूर हे मतदारसंघ समाजवादी पार्टीला सतत ताब्यात ठेवता येत नाहीत. बिहारमधील गोपालगंज, वैशाली, मधुबन या मतदारसंघांत यादव जातीचे मतदार पंधरा ते वीस टक्के आहेत, म्हणून राष्ट्रीय जनता दलाला कायम विजय मिळत नाही.

तरीही राजकीय नेते आपल्या जातीशी आपण प्रामाणिक व निष्ठावंत असल्याचे वारंवार सिद्ध का करतात? स्व-जातीयांना राजकीय पाठबळाची गरज पडेल तिथे का धावून जातात?

जातीशिवाय इतर कुठले चलन चालेल याची खात्री नसल्याने जातीयवादाचा हाच खेळ पुनःपुन्हा खेळला जातो.

हमखास हुकमी मतांचे पाठबळ असल्याचा आभास निर्माण केला, तर राजकारणात ‘वजन’ राहते, असा समज असल्यानेच ‘स्व’जातीच्या कार्यकर्त्यांचे जाळे विणले जाते. जातीबाहेर जाऊन आपल्या भागाचा समग्र विकास करण्यापेक्षा जातीय संघटना व पक्ष काढण्याचा शॉर्टकट सोयीचा वाटतो.

सध्याचे कायदाकर्ते आणि मनुस्मृतीकार यांच्यात धूर्तपणामध्ये विलक्षण साम्य आहे. मनुस्मृतीने ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र यांची आचारसंहिता तयार केली होती. ब्राह्मण व उच्चवर्णीयांसाठी विशेष कायदे होते. शूद्रांकरिता वेगळाच न्याय परंपरेने बहाल केला होता.

एकाच गुन्ह्याकरिता ब्राह्मणांना किरकोळ शिक्षा, तर शूद्रांना मृत्युदंड मिळत असे. निरंकुश सत्ताधीशांनी हजारो वर्षे हा दंडक अबाधित राखला. सत्तेसभोवती राहून उपभोग घेणाऱ्या बखरकारांनाही ह्या रूढीत गैर वाटत नसे. विरोधी आवाज निघालाच, तर जिभा छाटण्याकरिता तलवारी सज्ज असत.

काळाच्या ओघात लोकशाही आली आणि लोकांचे प्रतिनिधी संसदेतून कायदे तयार करू लागले. आधुनिक काळातील संसद सदस्यांचे वर्तन प्राचीन हिंदू कायदानिर्मात्यांसारखेच आहे. ‘जनतेची सेवा’ म्हणत स्वतःची चंगळ साधण्याकरिता सार्वजनिक निधीचा वारेमाप वापर करताना, त्यांना यत्किंचितही खेद वा खंत वाटत नाही.

कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीसाठी आयोग नेमला जातो, अनेक बाजूंनी प्रचंड खल होतो, त्यापुढे प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी बरीच वर्षे लागतात. (स्वतंत्र भारतात सात वेतन आयोग नेमले गेले.) खासदार मात्र त्यांची मुदत संपण्यापूर्वीच सर्व सोयी पदरात पाडून घेतात.

केवळ वेतनवाढ व झकास निवृत्ती वेतनच नाही, तर खासदारांनी सार्वजनिक निधीतून याशिवाय असंख्य लाभ प्राप्त केले आहेत.

प्रत्येक संसद सदस्य त्यांच्या मतदारसंघाचा विकास करण्यासाठी एक कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यास पात्र आहे. (पुढे तो दोन कोटी व आता पाच कोटी करण्यात आला आहे.) सार्वजनिक आणि खासगी उद्देश यांमधील आपपर भाव नष्ट करून हा निधी ‘आप्तेष्टांसाठी’ खर्ची पडतो, असा सार्वत्रिक अनुभव आहे.

सार्वजनिक कार्यासाठी वापरावा लागला, तर ‘आपल्या लोकांना’ कंत्राट देऊन द्रव्यास ‘वळण’ लावण्याचे कुशल कार्य केले जाते, याचे सामान्यज्ञान सर्वांना झाले आहे.

जनसामान्यांच्या निधीच्या अशा शोषणातूनही समाधान न पावलेल्या खासदारांनी अतोनात सवलतींत न्हाऊन घेतले आहे. आता अविवाहित खासदारास कोणत्याही कारणासाठी, देशभरातील इच्छित स्थळी, त्यांची इच्छा असेल त्या साथीदारासमवेत वातानुकूलित प्रवासाची मुभा हस्तगत झाली आहे.

याखेरीज, दरसाल एक लाख फोन कॉल्स करण्याची, पंचवीस हजार युनिट वीज जाळण्याची आणि दोन हजार किलोलीटर पाणी वापरण्याची चंगळ खासदार करू शकतात. जनतेचे प्रतिनिधी या नात्याने यासाठी त्यांना छदामही द्यावा लागणार नाही. यच्चयावत आजी व माजी लोकप्रतिनिधींचा हा भार लोकांनीच सहन करायचा आहे. (ही २०००मधील परिस्थिती होती.)

काळ, काम आणि वेगाचे अंकगणित वीज व पाण्यालाही लावले, तर डोके चक्रावून जाते. सर्वसाधारण जनतेच्या पैशांतून असली विलासी चैन कोण, कशी करू शकते? आपण ज्यांना मत देऊन निवडून देतो, त्यांना थोडाफारही सदसद्विवेक नसावा?

आपल्या खासदारांच्या कल्पनाशक्तीची भरारी थक्क करणारी आहे. त्यांनी त्यांच्या सुरक्षित भविष्याची काळजी किती सूक्ष्मतम पातळीवर जाऊन घेतली आहे, पाहा.

समजा, संसद विसर्जित झाली आणि वर्ष मात्र पूर्ण झाले नाही तर... विचलित होऊ नका. अशा आपत्तीजनक परिस्थितीत प्रवास, फोन, पाणी, वीज सवलती, सर्व भत्ते यांना कसलीही बाधा न येऊ देण्याची खबरदारी खासदारांच्या वेतन समितीने घेतली आहे.

अशा प्रकारे करकचून खर्च केल्यानंतरदेखील शेष काही राहिल्यास हा अनुशेष पुढील वर्षी फोन, पाणी-वीज खर्ची घालता येईल, असा चोख बंदोबस्त करून ठेवला आहे.

ही उपलब्धता पाहून, सध्याचा सत्ताधारी अभिजन वर्ग हा प्राचीन पूर्वजांचा कित्ता गिरवत असल्याचे लक्षात येते.

स्वतःच्या चैनीखातर सामान्यांच्या पैशाच्या नासाडीला रोखण्याकरिता डावे व कम्युनिस्ट यांच्यासकट एकाही खासदाराने चकार शब्दही काढला नाही, हे अतिशय धक्कादायक आहे.

भत्ते व कार्यालयीन खर्चाच्या मुद्द्यांवर विविध रंगांचे, भिन्न मतांचे खासदार एका जातीसारखे एकवटताना दिसतात. पक्षाची धोरणे, जाहीरनामे व आश्वासने यांमध्ये टोकाचा विरोध व विसंगती असली, तरीही वेतन व भत्त्यांसाठी सर्व खासदारांत एकमत होते.

यच्चयावत खासदार स्वतःच्या आर्थिक लाभाच्या प्रसंगी विविधतेतील एकता दाखवणाऱ्या इंद्रधनुष्याचे दर्शन घडवतात.

शेती, पाणी, आरोग्य, शिक्षण, महिलांना आरक्षण अशा जनतेच्या मूलभूत समस्यांवर खासदारांची एकी झाल्याचे हृदयंगम दृश्य चुकूनही दिसत नाही.

‘स्वहिताची जिवापाड जपणूक करणाऱ्या खासदारांच्या निषेधाचा स्फुट आवाजही जनतेमधून का उठत नाही?’ असा प्रश्न उपस्थित करून प्रो. गुप्ता त्यामागील कारणमीमांसा सांगतात,

‘सत्तेपुढे शहाणपण चालत नाही म्हणून आपण गप्प राहतो. कोणी सांगावे, त्यामधील एखाद्याकडे आपले काम पडेल, असाही सुज्ञ व धोरणी विचार येतो. मायबाप सरकारकडे सदैव याचना करावी, त्यांनी कनवाळूपणे मंजुरी द्यावी, ह्या प्राचीन काळातील गुलामी मनोवृत्तीचे अवशेष अजूनही आपल्या मनात शिल्लक आहेत.

लोकशाही ही केवळ मतपेटीपुरती मर्यादित नाही. फक्त मतदान करून जबाबदारी संपत नाही. आपली मानसिकता लोकशाही अनुरूप करावी लागेल.

कर भरणाऱ्या कोट्यवधींच्या पैशांवर चालणारी खासदारी ऐश थांबवण्याचा इशारा दिला नाही, तर ही ऐट उतरणार नाही.

दुर्दैवाने याविषयी सार्वजनिक व्यासपीठे, दूरचित्रवाणी वाहिन्यांवरून चर्चा झडत नाहीत. लोकांचा संताप दिसल्याशिवाय पुढारी काही ऐकून घेणार नाहीत.

नेत्यांना सुनवायचे असेल, तर आपल्याला कधीतरी उपयोगी पडेल, असा पाठीराखा न निवडता आपला प्रतिनिधी पाठवावा लागेल. आश्रयदाते, पुरस्कर्ते, कैवारी यांनी चालवलेली लोकशाही भ्रष्टाचाराची गंगोत्री असते. समाजाच्या कानाकोपऱ्यांत बजबजपुरी माजते.

खऱ्या प्रातिनिधिक लोकशाहीकडे वाटचाल करायची असेल, तर पोकळ वल्गना न करणारे हे चित्र समजून घ्यावे लागेल. आश्रयदात्यांच्या लोकशाहीमागील कारणे व परिणाम खूपच खोलवर दडलेले असतात.

आपण कसलीही हालचाल न करता क्वचित प्रसंगी न्यायालयीन अथवा नोकरशाहीच्या हस्तक्षेपामुळे लोकशाही प्रगत होईल, असा आशावाद भाबडेपणाचा ठरेल.’

१९५० मध्ये भारत ८५ टक्के ग्रामीण होता. २००१ मध्ये तो ६५ टक्के झाला आहे. गावांचे झपाट्याने शहरीकरण होत आहे.

शहरात अनामिकता लाभल्याने कुठलेही काम करण्यास संकोच वाटत नाही. घराणे वा कौटुंबिक पार्श्वभूमी आड येत नाही. याचा अर्थ शहरात गेल्यावर सर्व सोयी-सुविधा मिळतात असा नाही.

तरीही शहरातील निवडस्वातंत्र्य, संधीची शक्यता अधिक वाटल्याने गावातले गरीब शहर पसंत करतात. शहरात उपरेपणा, अनिश्चितता व असुरक्षितता वाटत राहते. त्यामुळे सतत गावाकडे जाऊन नाते टिकवले जाते.

सामाजिक सुरक्षिततेची हमी गावात शोधली जाते. गावाशी असलेले नाते तुटत नाही. परंपरा जपली जाते.

गाव आणि शहर, परंपरा आणि आधुनिकता, या दोन टोकांमध्ये लंबक हेलकावत राहतो. भूतकाळ आपल्या वर्तमानात सतत डोकावत राहतो.

सरंजामदारी गेली, तरी तिचे अवशेष गावात शाबूत आहेत. लोकशाही आली, तरी मनोवृत्ती सरंजामी असल्याने आधुनिकतेचा पाया भुसभुशीत राहिला.

वाढत्या कनिष्ठ मध्यमवर्गाबद्दल समाजशास्त्रज्ञ आशावादी आहेत. ‘त्यांना सेवा क्षेत्रात संधी मिळू शकते. कनिष्ठ मध्यमवर्गीयांना आर्थिक व सामाजिक प्रतिष्ठा लाभली, तर परस्परसंबंधात सुधारणा होईल. राज्य पातळीवर शिक्षण, आरोग्य व रोजगारासाठी परिणामकारक योजना राबवली, तर कनिष्ठ वर्ग व कनिष्ठ मध्यमवर्गाचा ताण खूप प्रमाणात दूर करता येईल,’ असे प्रो. गुप्ता यांचे मत आहे.

व्यक्तिकेंद्रित समाजात संस्थेपेक्षा व्यक्तीला अतोनात महत्त्व असते. व्यक्ती श्रद्धा, व्यक्तिस्तोम, व्यक्तिनिष्ठा यांवरच सार्वजनिक संबंध आधारलेले असतात.

युरोपात शंभरी ओलांडलेली नियतकालिके (‘द इकॉनॉमिस्ट’, ‘सायंटिफिक अमेरिकन’, ‘द गार्डियन’), विद्यापीठे (ऑक्सफर्ड, केंब्रिज, व्हिएन्ना) आजही त्यांचा अत्युच्च दर्जा टिकवून आहेत. (आपल्याकडे?)

अर्थशास्त्रज्ञ जॉन केनेथ गालब्रेथ यांनी ‘भारतात यंत्रणा कधीच कार्यरत नसते, काही व्यक्तींमुळे यंत्रणा चालल्याचा भास होतो,’ असे निदान ७० वर्षांपूर्वी केले होते.

स्वातंत्र्य चळवळीच्या काळात उदयाला आलेल्या संस्था आता क्षीण अथवा नष्ट झाल्या आहेत. त्यांची जागा घेणाऱ्या नवीन संस्था उगवत नाहीत, असा कुंठित अवस्थेचा हा काळ आहे.

व्यक्ती असो वा नसो, संस्थेचा कारभार कार्यक्षम, पारदर्शक व सचोटीचा असेल, अशा संस्थांची निकड आहे.

१९४९ मध्ये लखनौ विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात पं. नेहरूंनी विद्यार्थ्यांसमोर यासंबंधी विचार मांडले होते,

‘सरकार म्हणजे मायबाप!’ ही भावना ब्रिटिशांनी रुजवली. आपण नुसता याचनेचा अर्ज करावा आणि सरकारने दयाळूपणे मागण्या पुरवाव्यात, अशी जनतेची भावना झाली.

ही मानसिकता टिकून राहणे लोकशाहीला घातक ठरत आहे. कमालीची निष्क्रियता जोपासणारी ही मानसिकता असेल, तर लोकशाहीतील सरकारला काम करणे अवघड होईल. विकासाची कामे सर्वदूर नेता येणार नाहीत.

स्थितिशीलता जपणारी ही मानसिकता कशी दूर करायची, हीच आजची गहन समस्या आहे.’

शेती असो वा उद्योग, शिक्षण असो वा सामाजिक सुधारणा, या सगळ्याच बाबतीत अडथळ्यांची शर्यत आहे, हे नेहरू ओळखून होते. जातिप्रथेच्या रगाड्यात रुतलेला गावगाडा बाहेर काढणे सहजशक्य नव्हते.

विकासासाठी अनुकूल मानसिकतेचा अभाव हा मोठा अडसर होता. भारताला सर्वार्थाने आधुनिक करण्यासाठी नेहरूंनी अथक प्रयत्न केले.

भक्कम पायावर उभ्या असलेल्या इमारतीच्या मजबुतीकरणासाठी पुन्हा तशाच भगीरथ कष्टांची आवश्यकता आहे.

समाप्त

 


8/14/26

दाखवण्यापुरती आधुनिकता/ Modernity for Show.

एक गोष्ट बरी म्हणायची की, प्रत्येक जण स्वतःला ‘विज्ञानवादी’ समजत असतो. (‘सुरक्षित भविष्या’ची विक्री करणाऱ्या तमाम बुवा, कुडमुडे यांचीसुद्धा ‘तशीच’ धडपड असते.) तसेच प्रत्येकाचा आपण ‘आधुनिक’ असल्याचा दावा असतो. गंडेदोरे व खडे यांनी मढून गेलेल्या वेगेवेगळ्या क्षेत्रांत चमचमणाऱ्या व्यक्तींचा ‘तसा’ अट्टहास असतो. अशा ‘भास आभासाच्या’ पर्यावरणातून बाहेर पडले तर आधुनिकता उमजून घेता येते.

प्रो. डॉ. दिपंकर प्रो. गुप्ता ‘मिस्टेकन आयडेंटिटी, इंडिया बिटविन वर्ल्डस’ हार्पर कॉलिन्स प्रकाशन, ग्रथांचिया द्वारी, जग बदलू पाहणाऱ्या विचारांची यात्रा, अतुल देऊळगावकर, प्रकाशक-विश्वकर्मा पब्लिकेशन.

कधी काळी वेद हे अपौरुषेय मानल्यामुळे त्यांच्याविषयी काहीही बोलायचे नाही, ‘वेद हेच प्रमाण’ असा दंडक होता. ख्रिश्चन, पारशी, ज्यू, मुस्लीम या सर्व धर्मसत्तांनी मुकाट जनतेला मुकाट राहण्याचा आदेश दिला होता. प्रश्न विचारणाऱ्या वा नवीन उत्तरे शोधणाऱ्या वैज्ञानिकांना मृत्युदंड सोसावा लागला.

औद्योगिक क्रांतीनंतर राजसत्तेवरील धर्मसत्तेचा लगाम निसटत गेला. विज्ञानामुळे सृष्टीचे आकलन होऊ लागले. युरोपातील घडामोडी वेगवान होत्या. आज तिथे कुणीही, कुणावरही, काहीही बोलू वा लिहू शकतो. आपण विचारांची चिकित्सासुद्धा नाकारतो. महापुरुषांच्या नावाने ‘स्वतःची दुकानदारी’ चालवतो. आपल्या अस्मिता वरचेवर अतिशय नाजूक होत चालल्या आहेत. मुद्दे बाजूला ठेवून गुद्द्यांवर येण्याचे प्रमाण वाढतच जातेय. ही दांडगाई कुठल्या काळातली म्हणता येईल? आणि त्याची कारणे कोणती? प्रेमविवाह करणाऱ्या तरुणींचा बळी, हुंडाबळी, लैंगिक छळ, सार्वजनिक ठिकाणी होणारी हिंसा, अशा असंस्कृत कृत्यांमागील मानसिकता ही मध्ययुगातील असते. आक्रमकतेला, हिंस्रतेला आधुनिकतेचे प्रतीक ठरवले जाते. (जाहिरातींतून व चित्रपटांतून हा खास संदेश दिला जातो.) बारकाईने पाहिल्यावर लक्षात येईल की, यांपैकी कोणतीही बाब आधुनिक नाही. ते भूतकाळातील सरंजामी मनोवृत्तीचे अवशेष आहेत. खियांवरील अत्याचारांचे, घराण्याचे व नात्यांचे प्रदर्शन आणि प्रचलित नियमांना नकार ही त्याची लक्षणे आहेत.

आधुनिकता ही लहान बाळाच्या पावलाने येत असते. जीवनाच्या सर्व क्षेत्रांत रुढी आणि परंपरा खोलवर रुजलेल्या भारतासारख्या खंडप्राय देशात ती आणखी मंद गतीने येते. समाजातील स्तरीकरणाला कर्मकांडाचे अधिष्ठान लाभल्याने जातिभेदांवर आधारलेली रचना उभी राहिली. जातीच्या स्तरीकरणाबाबतीत पारंपरिक भारताचा हात इतर कुठलाही देश धरू शकणार नाही. त्याचे परिणाम आजही जाणवतात. औद्योगिकीकरण व लोकशाहीमुळे बराच फरक पडला असला, तरीही अजून बरीच मजल गाठावी लागेल. प्रगतीची फळे परंपरेने चालत आलेल्या अभिजनांपुरतीच मर्यादित राहिली. सत्ताधारी बदलत गेले; परंतु पारंपरिक मूल्यांचा वारसा तसाच पुढे चालत राहिला. भारताचे शतखंडित स्वरूप ही त्याची परिणती आहे. एकसंधता नसल्याने विकासाचे प्रश्न जटिल होत आहेत. आर्थिक समस्यांमागे सामाजिक पैलू आहे. भारतासारख्या देशात आधुनिकीकरणाच्या प्रक्रियेला गती आणण्यासाठी विशेष व अथक प्रयत्न आवश्यक आहेत. त्याकरिता आधुनिकता म्हणजे काय? तिचे पुरस्कर्ते व विरोधक कोण व का असतात? समाजशास्त्रज्ञ प्रो. डॉ. दिपंकर प्रो. गुप्ता यांनी ‘मिस्टेकन आयडेंटिटी इंडिया बिटवीन वर्ल्डस’ ह्या पुस्तकातून आधुनिकतेस बाधक ठरणाऱ्या प्रथा व परंपरांचे सविस्तर विश्लेषण केले आहे.

तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे आपल्याकडे आधुनिकता अनायासे आली. त्या आधीपासून देशातील सुधारक अथक झटत होते. आगगाडी आल्यावर प्रवासाला गती आली, सोय झाली. आगगाडी टाळता येत नव्हती. शेजारी निवडता येत नव्हता. साहजिक, प्रवासात कोणत्याही जातीचा शेजारी खपवून घेणे भाग पडले. नागरीकरणाच्या प्रक्रियेत सार्वजनिक वावर असलेल्या ठिकाणी जात-पात बाळगणे अशक्य झाले; पण जात काही मनातून जाता जात नाही. भारतातील आधुनिकता ही नवनव्या तंत्रज्ञानाच्या आगमनामुळे आणि शहरीकरणामुळे लादलेली आहे. म्हणूनच तंत्रज्ञानाची उपकरणे वापरणे असा सुलभ अर्थ लावून आधुनिकतेकडे सर्रास पाहिले जाते. वास्तविक, आधुनिकता ही मनोवृत्तीशी निगडित आहे. सार्वजनिक ठिकाणी घडणाऱ्या वर्तनातून व सामाजिक संबंधांतून ती व्यक्त होते.

‘आधुनिक’ समाजाची चार ठळक वैशिष्ट्ये सांगता येऊ शकतात. वैयक्तिक प्रतिष्ठा, सार्वत्रिक निकष, जन्मामुळे वैयक्तिक विशेषाधिकार (प्रिव्हिलेज) किंवा नकार व सार्वजनिक जीवनातील उत्तरदायित्व या चार निकषांवर आधुनिकता तपासता येते. समाज कुठले तंत्रज्ञान वापरतो? किती वेगवान सुविधा उपभोगतो? उपभोगवादितेचं (कन्झ्युमेरिझम) प्रमाण किती आहे? यावरून काहीही लक्षात येत नाही. तंत्रज्ञान आणि उपभोगवाद म्हणजे आधुनिकता नव्हे. पेहरावामुळे मानसकिता बदलत नसते. भारतामध्ये आधुनिकतेचा खरा अर्थ लक्षात न घेता सुलभीकरण करीत तंत्रज्ञानाधारित उपकरणं, वस्तू बाळगण्यालाच (बहिरंगाला) आधुनिकता मानलं जात आहे.

आधुनिक समाजात समानता नांदत नसली आणि अनेक प्रकारचे वैविध्य असले, तरीही परस्परांची प्रतिष्ठा जपली जाते. त्यासाठी समानता ही मनातून स्वीकारली पाहिजे. तो मनोवृत्तीचा भागच झाला पाहिजे. आधुनिकतेचा पायाच मुळी समान संधी हा आहे. स्वतःच्या विकासाकरिता सर्वांना समान संधी मिळू लागणे हा इतिहासातील क्रांतिकारक टप्पा होता. सरंजामी रचनेमध्ये राज्यकर्तेच सर्वेसर्वा होते. त्या व्यवस्थेत नागरिकांना अजिबात स्थान नव्हते. आधुनिक समाजात नागरिकत्व मागता येते. फ्रेंच राज्यक्रांतीने स्वातंत्र्य, समता आणि बंधुता यांचा मंत्र दिला. खास लोकांपासून आम लोकांपर्यंत, बंदिस्ततेकडून खुल्या व्यवस्थेकडे वाटचाल झाली. ‘आपली प्रगती आपण करू या’, ही भावना रुजू लागली. एकमेकांना सहकार्य करून स्वतःचा आणि समाजाचा विकास करण्याचे पर्व सुरू झाले. सामूहिकता हा आधुनिक जीवनाचा भक्कम पाया झाला. केवळ कायद्याने सर्व समान ठरले नाही, तर सहअनुभूती, सहभाग हा सार्वजनिक जीवनाचा आधार ठरला. असे परस्परसंबंध भारतामध्ये आढळत नाहीत. एकमेकांच्या कल्याणाकरिता आपली भूमिका महत्त्वाची आहे, ही भावना दिसत नाही. भारतीय उच्चभ्रू हे वंचितांचा यत्किंचितही विचार करत नाहीत. त्यांना सार्वजनिक सुविधांसाठी पैसा वा वेळ घालवायचा नाही. त्यांनी ‘स्वतःला समाजापासून अलग करण्याची प्रक्रिया म्हणजे आधुनिकीकरण’ असा अर्थ लावला आहे. अत्याधुनिक उपकरणांनी सुसज्ज रुग्णालयातील व्यवस्थापक व डॉक्टर तिथल्याच कर्मचारी, परिचारिका वा रुग्णांशी किती तुसडेपणाने वागतात? अद्ययावत तंत्रज्ञान हाताळणाऱ्या उद्योगसमूहातील निर्णयप्रक्रिया अगदी जुनाट सरंजामी धाटणीची असते. आदेश वरून खाली एका दिशेनेच जात राहतात. खालून वर काही सुचवण्याची सोय नसते.

भारतात उच्चवर्गीय स्वतःला मध्यमवर्गीय म्हणवून घेतात. पाश्चात्त्य देशांत मध्यमवर्गीय खऱ्या अर्थाने मध्यम स्तरावर असतात. एकंदर लोकसंख्या जवळपास मध्यमवर्गीय असते. त्यांचा वर्गीय स्तर त्यांच्या खरेदीवरून अथवा उपभोगावरून ठरत नाही, तर मध्यमवर्गीय त्यांच्या अभिव्यक्तीवरून ओळखले जातात. समाजातील घडणाऱ्या कुठल्याही घटनेबद्दल ते जागरुकपणे प्रतिक्रिया व्यक्त करतात. सरंजामीला मूठमाती देऊन युरोपातील लोकशाही बळकट करण्याचे ऐतिहासिक कार्य सजग मध्यवर्गीयांनीच केले होते. या पार्श्वभूमीवर आपल्याकडील स्व-केंद्रित व मिजासखोर मध्यमवर्गीयांचे अधःपतन ठळकपणे जाणवते. आपल्याला ‘अभिजन’ समजणारा व ‘अभिजन’ होऊन धन्य होणाऱ्या मध्यमवर्गाची मानसिकता इतरांना तुच्छ लेखण्याची आहे.

दारिद्र्य हे आपल्या सार्वजनिक आयुष्याचे कडवट सत्य आहे. दारिद्र्य ही संकल्पना विपुलता, समृद्धीच्या विरुद्धार्थी एवढीच नाही. दारिद्र्य केवळ साधनांपुरतेच नसते. जगातील कित्येक सुखांपासून लोक वंचित असतात. माहिती आणि ज्ञान, अनुभव आणि क्षमता, प्रेम आणि आपुलकीपासून ते दूर राहतात. बेसुमार जंगलतोड करून लाकूड वापरणारेच आदिवासींना भिकेला लावतात. त्यांच्या दारिद्र्याला आपणच जबाबदार असतो. त्यांना स्वाभिमानाने जगवण्याची, उद्योगी व स्वयंपूर्ण करण्याची निकड आपलीच असली पाहिजे. आपला आराम, आपली चंगळ ही गरिबांच्या श्रमामुळे पोसली जात आहे. या सत्याला सामोरे जाण्याची आपली तयारी नसते. भारतामधील जगण्याची श्रीमंत शैली ही आर्थिक परिस्थितीमुळे नसून, ती सहज उपलब्ध स्वस्त मजुरांमुळे आहे. देशातील सुमारे १२ कोटी धनवानांचा भार कोट्यवधी मजुरांना सहन करावा लागतो. या कष्टकऱ्यांचे कुपोषण, भूक व हलाखीचा नायनाट करण्याचा, गरिबांचा आर्थिक स्तर उंचावण्याचा विचार त्यांना शिवतदेखील नाही. सत्तेच्या केंद्रात आपले स्व-हितसंबंध तयार करणे व जोपासणे, कौटुंबिक संबंधांचा वापर करून घेणे आणि तहेत-हेचे विशेष लाभ (अधिकार असल्याच्या थाटात) पदरात पाडून घेणे, हेच मध्यमवर्गीयांचे स्वप्न व उद्दिष्ट असते. त्यांना सार्वजनिक आयुष्य, सार्वजनिक संस्था यांच्याविषयी घृणा वाटते. व्यक्तिस्वातंत्र्याबद्दल त्यांना काही देणेघेणे नाही. ते टोकाचे व्यक्तिवादी (इंडिव्हिज्युऍलिस्ट) असतात. ‘गरीब हेच त्यांच्या गरिबीला कारणीभूत आहेत.’ त्यांना शिक्षण नको. स्वच्छता पाळत नाहीत. अंघोळ करत नाहीत. सेवाभावी संस्था त्यांच्यासाठी काही का करत नाहीत? सरकार त्यांच्यासाठी आमच्याकडून कर घेत राहते.’ ही त्यांची भावना असते. खरे तर भारतीय मध्यमवर्गीयांना आधुनिकता नकोशीच आहे. आधुनिकपूर्वकाळातील सर्व विलास उपभोगायला मिळत असल्याने आधुनिकतेची मूल्ये रुजविण्यामधला खरा अडसर मध्यमवर्गच आहे.

पाश्चात्त्यांचे अंधानुकरण करणाऱ्या व्यक्ती गल्लीबोळांत दिसतात. मुख्यतः राहण्याची, खाण्या-पिण्याची ती नक्कल असते. इन्स्टाग्राम चॅटिंग-पिझ्झा-पेप्सी-जीन-शरीरावर टॅटू अशा पाश्चात्त्यांमधील मूर्खपणाच्या अंधानुकरणाला पाश्चात्त्यीकरण मानले जाते. सदान् कदा छोट्या पडद्यावरून स्व-प्रदर्शन करणे, ‘अंगठे’ दाखवणे, ते मोजत राहणे, ते ‘ज्ञान’ पुढच्यांना पाठवत राहण्याला ‘काळानुरूप’ ठरवले जाते. सर्वांना समान अधिकार, समान आदर हा पाश्चात्त्यीकरणाचा गाभा आहे. सार्वजनिक जीवनातील नियम पाळणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. केवळ कायद्याचे बंधन म्हणून नाही; तर ते समाजमनाने स्वीकारले आहे. या अर्थाने ती वैचारिक संकल्पना आहे. याउलट, आपल्याकडे वैयक्तिक आणि सार्वजनिक आयुष्यात प्रचंड तफावत आढळते. तिकडे ‘पोलीस असो वा नसो, सिग्नल तोडू नये,’ हा संकेत सर्वांनी मनापासून स्वीकारला आहे. आपल्याकडे असे नियम तोडण्याला भूषण ठरवले जाते.

याउलट, आपल्याकडे वैयक्तिक आणि सार्वजनिक आयुष्यात प्रचंड तफावत आढळते. सोवळ्यासंबंधीच्या कितीतरी रीती शतकांपासून चालत आल्या आहेत. त्या स्वच्छतेशी व पावित्र्याशी जोडलेल्या आहेत. स्नान-शौचास कुठे जावे? ‘घाण’ काढण्याच्या सर्व प्रक्रिया ‘घरा’बाहेर कराव्यात. न्हाणीघर हे स्वयंपाकघर व देवघरापासून दूर असावे. स्वयंपाकघरातील स्वच्छतेला अतोनात महत्त्व आहे. (युरोपात ड्रॉइंग रूमला ते स्थान आहे.) घाण काढणारे, सफाई करणारे अपवित्र-अस्पृश्य आहेत. हा वर्णभेद त्याच्याशी निगडित आहे. श्रम टाळण्यासाठीची आणि लादण्यासाठीची ती चलाखी होती. अंगवस्त्र व गणिकांशी शरीरसंबंध ठेवताना हे सोवळे आड येत नसे. (युरोपात इतर प्रसंगी हेटाळलेल्या कृष्णवर्णीय महिलांची स्वयंपाक करण्यासाठी; इतकेच नव्हे तर, तान्ह्या बाळाला पाजण्यासाठीही मदत घेतली जायची.)

भारतात स्वच्छता ही निवडक असते. वैयक्तिक जीवनातील स्वच्छतेचा आग्रह सार्वजनिक आयुष्यात अजिबात नसतो. स्वतःच्या घरातसुद्धा स्वयंपाकघराची स्वच्छता न्हाणीघर वा संडासात आढळेल असे नाही. स्वतःच्या घराला स्वच्छ ठेवून सगळी घाण घराबाहेर टाकण्यात कसलाही संकोच वाटत नाही. संडास उपलब्ध नसल्यामुळे कोट्यवधींना उघड्यावर बसावे लागते. सध्या आशिया खंडातील कुठल्याही तिघांपैकी एकाला पिण्यासाठी स्वच्छ पाणी मिळत नाही. निम्या आशियायी नागरिकांना संडासांची सोय नाही. दरवर्षी गरीब देशांतील दोन कोटी बालके दूषित पाण्यामुळे होणाऱ्या रोगांमुळे दगावतात.

प्रो. गुप्ता म्हणतात, ‘इस्लाम वा ख्रिश्चन धर्मासारखी हिंदू धर्मात सामूहिकतेची गरज कधीच भासत नाही. संतांनी भक्तिसंप्रदाय स्थापून सर्व जातींना एकत्र नेण्याचा आटोकाट प्रयत्न केला. अशा सामूहिकीकरणाला गरीब व कष्टकरी जनतेने मनापासून स्वीकारले. परंतु ‘अभिजन’ वर्ग कटाक्षाने दूर राहिला. मागील ३० वर्षांपासून चिमुकल्या पंथांची संख्या वरचेवर वाढत आहे. नवनव्या प्रवचनकारांना राष्ट्रीय संत, महाराज संबोधले जात आहे. त्यांच्या कार्यक्रमांना गर्दी दाटत आहे. ही नेमकी कुणाची मानसिक गरज आहे? याकडे मध्यम व उच्चवर्गीयांचा ओढा आहे. गुरूच्या अत्यंत निकट असावे. पापक्षालन होऊन त्यांच्या सहवासात आपले घर पवित्र व्हावे, मोक्षप्राप्तीसाठी या ‘शॉर्ट कट’ची धनिकांना विलक्षण आस असते. कित्येक कोट्यधीश, उच्चपदस्थ, सिनेमंडळी यांना महत्त्वाचा निर्णय, शुभकार्य, कठीण प्रसंग यांतून तरुन जाण्याकरिता गुरूंची वा महाराजांची भेट अत्यावश्यक वाटत असते. त्याशिवाय महाराजांच्या जितके जवळ जाता येईल, तितकी त्यांची प्रतिष्ठा उंचावली जाते. त्यातून स्पर्धा निर्माण होते. ‘महाराजांनी’ कोणत्या भक्ताकडे वास्तव्य करावे याकरिता बोली बोलली जाते. हे भक्त महाराजांच्या प्रवचनाचे भव्य आयोजन करतात. त्यांनी स्वतःच्या दूरचित्रवाणी वाहिन्या सुरू केल्या आहेत. त्यांची एक स्वतंत्र मार्केटिंग यंत्रणा तयार झाली आहे. ह्या सर्व ‘व्यवहारात’ उच्चवर्गीयांचे हितसंबंध जोपासले जातात. जातीचे भेदभाव, उच्चनीचता, वर्गीय भेद या कुठल्याच अहंकाराला बाधा पोहोचत नाही, तरी समाजमान्यता मिळाल्याचा भास होतो. हजारोंच्या गर्दीला एकत्र आणल्याचे समाधान लाभते. भारत व जपानमध्ये या प्रकारच्या पंथांचा सुळसुळाट झाला आहे. या प्रकारात मध्यमवर्ग भरडला जात आहे.’

अपूर्ण शिल्लक भाग पुढील लेखामध्ये.

 

8/12/26

आदिम दुःखाचे मुक्तिस्थानक हॉस्पिटल — Hospital: A Sanctuary for the Suffering.

मानवी जीवनात कळत-नकळत प्रवेशणारी संस्था म्हणजे रुग्णालय-हॉस्पिटल ! आज घडीला अत्यंत वादग्रस्त, परंतु तितकीच गरजेची असणारी ही संस्था प्राचीन काळापासून दुःखमुक्तीचे एक केंद्र म्हणून कार्यरत आहे. जीवक व सुश्रुताच्या परंपरेतील अनेक डॉक्टर आजही त्याच निष्ठेने आपले सेवा कार्य करताहेत. त्यांना अनेक कुशल अकुशल तंत्रज्ञांची मदत होत आहे. परंतु अंतिमतः ही सारी माणसेच आहेत. गुण आणि दोष असणारी, स्वतःची सुख-दुःखे, व्यथा-वेदना असणारी.आपण या सर्वांकडे एका रुग्णाच्या किंवा ग्राहकाच्या नजरेने पाहतो.परंतु डॉ. रवींद्र श्रावस्ती हे हॉस्पिटलकडे दुःखमुक्तीचे जीवनदायी केंद्र म्हणून पाहतात. व्यथा-वेदना घेऊन येणारी व ती दूर करण्यासाठी अहोरात्र झटणारी माणसे नीटपणे समजून घेऊन, शब्दांतून मांडण्याचे गुंतागुंतीचे काम येथे लेखकाने ललित स्वरूपात केले आहे. या लेखनात बुद्धाचा दुःख स्वीकारण्याचा आणि त्यातून मुक्त होण्यासाठी झगडण्याचा विचार आहे आणि त्याला कारुण्याच्या भावनेची जोड आहे. म्हणून हे लेखन मेडिको व नॉनमेडिको वाचकांसाठी महत्त्वपूर्ण व अनुभवसंपन्न बनविणारे आहे.

१. रुग्णांचा कारखाना उर्फ मेल मेडिकल वार्ड

हा वार्ड सदा गजबजलेला. कितीही स्वच्छ केले तरी घाणेरडा होणारा. रोगगच्च वार्ड. रोगाचे प्रकार तर किती? प्रचंड ! मोजदादच करता येणार नाही.

वेदनांचे प्रकारही भरपूर आणि त्याची जातकुळीही भिन्नच. आकांत, आक्रोश यांचे प्रमाण तर अतिप्रचंड ! हृदय तर धसका घेईलच. चक्क सारे शरीर धसकटून जाईल, उचकटून जाईल असे टाहो इथल्या गजबजलेल्या वार्डमधून बाहेर पडत असतात. मृत्यूची जा ये इथे हमखास चालू असतेच. त्यापेक्षा जगण्याची जिवंत चिवट लढाई इथे चालू असते. या वार्डचे श्वास चोवीस तास, १२ महिने, वर्षोन् वर्षे चालूच आहेत. अनेकांचे श्वास इथे गेले, तितकेच आलेही! पण या वार्डाने मात्र श्वासणे सोडले नाही. या वार्डाला कुलूप घातलेय असेही कधी झाले नाही. एखाद्या दिवशी या वार्डमध्ये कुणीच माणूस आला नाही, असेही कधी झाले नाही.

तर असा हा मेल मेडिकल वार्ड उर्फ पुरुष वैद्यकीय कक्ष. आत प्रवेश केल्या केल्या दोन चार बेडवर नाकात नळी घातलेले चार दोन रुग्ण हमखास दिसतीलच. चिक्कार दारू पिऊन बेशुद्ध झालेले किंवा पिकावर फवारण्यासाठी वापरतात ते 'रोगार'सारखे पातळ विष प्यायलेले रुग्ण ह्या बेडवर न चुकता दिसतातच.

दोन्ही प्रकारचे रुग्ण मोठमोठ्याने ओरडत असतात, शिव्या देत असतात, दंगा दंगा करत असतात. एक ओरडला की लगेच दुसरा ओरडतो. दुसऱ्याने शिवी दिली की, पहिला तितक्याच तत्परतेने शिवी हासडतो. दोघांची जुगलबंदी चाललेली असते. गंभीर वातारवणात तेवढीच लोकांची मौजमजा. दारू प्यायलेला

शुद्धीवर येत असताना दंगा करत असतो तर दुसरा विष प्यायलेला विषावर उतारा म्हणून दिलेल्या अॅटोपिनच्या ओव्हर डोसमुळे असंबंध बडबड किंवा शिव्या देत असतो. काही असो त्या दोघांच्या जुगलबंदीमुळे मेल मेडिकलमधील गंभीर वातावरण मिस्किल झालेले असते.

त्यापुढील पाच-सहा बेड तर जवळजवळ राखीवच । दारूच्या दुष्परिणामामुळे झालेले आजार घेऊन वावरणारे लोक या बेडवर विसावलेले असतात. पिवळे जर्द डोळे तसेच पिवळे झालेले शरीर असे रुपडे असलेले, लिव्हर खराब झाल्यामुळे कावीळ झालेले लोक. तिथेच कुठेतरी अॅडमिट असतात. चेहरा सुजलेला, हात पाय सुजलेले, पोटात पाणी भरलेले असे रुग्ण मिळतातच. दारू पिऊन पिऊन लिव्हर जेव्हा दगडासारखे होते, तेव्हा असे पाणी शरीरभर पाझरत राहते. सरकारी 'उपसा जलसिंचन योजने' सारखे. कितीही पाणी काढले तरी फुटलेले नळ पाझरतात तसे यांचे 'असायटिस' नावाचे पाणी पोटातून झरतच असते.

सलाईनची जाडजुड सुई पोटाच्या त्वचा व स्नायूतून आरपार घुसविल्यावर पोटाच्या पोकळीत साचलेले पाणी (Ascites) सलाईनच्या नळीमधून वाहू लागते. ते काचेच्या बाटलीत साठविले जाते. दररोज ४-५ लोकांच्या पोटांमधून असे पाणी काढावेच लागते. वाईट गोष्ट अशी की, दुसऱ्या दिवशी पोट पुन्हा तसेच पाण्याने तुडुंब भरलेले असते. कोयना धरण भरल्यासारखे. मग पुन्हा उपसा करा. जणू उपसा जलसिंचन योजना.

कुणीतरी या लोकांच्या सुटलेल्या पोटाला बघून खवचटपणे म्हणते Ever pregnant never delivered!

एके दिवशी मी एका वयस्कर 'अल्कोहोलिक ड्रिंकर'च्या पोटातील पाणी काढत होतो - ड्रेन करत होतो. का कोण जाणे मला बोलण्याची उबळ आली. मी त्याला विचारले, 'काय मामा, पानी कंच्या नदीचं? क्रिश्नेचं की पंचगंगेचं?'

मला वाटलं आजोबा उसळेल. लाखोली वाहील. त्यानं तसंच इरसाल उत्तर दिलं, 'पानी कोयनेचं हाय! धरणाचं नव्हं. व्हात्या नदीचं. घे हात धुन ! घे चुळ भरून !'

—-----

—-----

मघाच्या ४-५ कॉटच्या जागेतच कुठेतरी कावीळ मेंदूत घुसल्यामुळे बेशुद्ध झालेले रुग्ण अॅडमिट केलेले असतात, यांची स्थिती मात्र भयानकच, अतिशय गंभीर, मृत्यूच्या पावलांनी गजबजलेली ही कॉट, नाकातून जठरात सोडलेली नळी. त्यातून येणारे रक्त नावाचे काळपट पाणी. लघवी मार्गात घातलेल्या नळीतून येणारा युरीनचा पिवळाजर्द स्राव, पोटात तुडुंब घुसलेले पाणी. ते बाहेर काढावे तर आणखी शुद्ध हरपणार किंवा माणूस दगावणार. लिव्हरच्या ठिकऱ्या झालेल्या आणि मेंदूच्या साऱ्या संवेदना बधीर झालेल्या. मध्येच आकडी येईल, झटके येतील, मध्येच आरडाओरड ऐकायला येईल. ब्लड, अॅल्बुमिन, डेक्स्ट्रोज, बी कॉम्प्लेक्स, लॅक्ट्युलोज कायबाय चालू असते. शून्य उपयोग आणि एक दिवस भयाण मृत्यू माणसाचे गाठोडे करतो. गाठोड्यात बांधलेल्या त्याची तरुण बायको हंबरडा फोडते -

धन्या आता तुला कुटं शोधू ?

पाखरा तुला कुटल्या घरट्यात बघू ?

कुटं हुडकू रे, धन्या ?

वाद्या, कुटं बघू तुला, कुटं शोधू ?

काठी म्हनत नव्हतास. लोकांड म्हणत नव्हतास दना दना पाटीवर हानत हुतास. आता त्या पोरक्या पाटीवर कोन काठी हानणार रे, वासरा! आता चिपाड तर हानायला ये रे, लेकरा...'

(वासरू, लेकरू ही सारी विशेषणं नवऱ्यासाठीच बरं)

आता थोडं पुढं गेल्यावर कोपऱ्यात ३-४ बेड आहेत. भिंतीवर कसलेसे डाग आहेत. तसे बेडवरसुद्धा काळे, लाल, पिवळे डाग आहेतच. दुर्गंधी तर इथे सदाचीच ठाण मांडून असते. पॅरालिसीस उर्फ अर्धांगवायू झालेले रुग्ण इथे ठेवलेले असतात. हात हालत नाही, पाय हालत नाही, शरीर हालत नाही, बोलता येत नाही किंवा चाचरत बोलता येते. थोडे शुद्धीवर किंवा पूर्ण बेशुद्ध, असे रुग्ण. या हॉस्पिटलमध्ये अॅडमिट होण्यापूर्वी अकिवाट, नागरमनोळी इथे यांना दाखवून आणलेले असतेच. त्यावेळेस एखादा माणूस चालत असतो तो इथे येईपर्यंत निश्चल झालेला असतो. बोलता माणूस 'अबोल' झालेला असतो किंवा शुब्बीवर असलेला माणूस बेशुद्ध झालेला असतो !

अंगारा-भंडारा असले 'प्राचीन आर्ट' ही कपाळावर विलसत असतात. गंडेदोरे, भंडाऱ्याची पेटी असले 'प्राचीन फॅशनेबल' आयटम कडोसरीस किंवा हातापायात, गळ्यात गुंडाळून त्यांना आणलेले असते. एवढे करून फरक पडलाच तर पडला म्हणून इथे आधुनिक दवाखान्यात आणलेले असते.

पीजी डॉक्टर येतो. तपासतो आणि 'स्ट्रोक झालाय' म्हणून सांगतो. सी.टी. स्कॅन करायला लागेल म्हणून सांगून 'रेफरल चिट' देऊन निघून जातो. प्राथमिक तेवढे उपचार सुरू केले जातात.

गंमत म्हणा किंवा ट्रॅजेडी म्हणा आता पैसे संपलेले असतात. दुसऱ्या तिसऱ्या दिवसाची वाट पहात ते निश्चेष्ट शरीर पूर्ण निदानाची आणि योग्य ट्रिटमेंटची वाट पहात बसते. कधीतरी सी.टी. स्कॅन होतो. त्याचा रिपोर्ट यायला अर्धा एक दिवस जातो. रिपोर्ट येतो तोही भल्या रात्री किंवा दुसऱ्या दिवशी दुपारी. मेंदूत रक्तस्राव किंवा मेंदूला रक्त पुरवठा नाही असा रिपोर्ट. मग खरी ट्रिटमेंट सुरू होते. तोपर्यंत बराच जिवंत मेंदू मेलेला असतो. महत्त्वाचा काळ (Crucial period) वाया गेलेला असतो. वाचलेला मेंदू थोडा थोडा काम करू लागतो. किंवा तोही थकून भागून कधीतरी मरून जातो. नंतर माणूस मरतो.

ज्या समाजाचा मेंदूच हरवलाय,तिथे माणसाचा मेंदू पॅरालाईज होणारच.योग्य उपचाराविना सडून जाणारच !

—--

—--

आता वार्डच्या त्या कोपऱ्यात पहा. दिसले? खोकलणारे, धापणारे लोक. नाकात ऑक्सिजनची नळी आणि भात्यासारखी धपापणारी छाती. हिरवा पिवळा कफ उर्फ बडका किडनी ट्रे मध्ये किंवा भिंतीच्या फरशीवर फेकलेला. इथलीही दुर्गंधी नाकातले संवेदनेचे केस जाळणारी. नाकालासुद्धा स्नायू असतात ते इथे आल्यावर कळते. छातीचे स्नायू एवढे दमतात की शरीराला श्वास घेण्यासाठी इतर स्नायूंची मदत घ्यावीच लागते. पोटाचे, मानेचे पुढील स्नायू: एवढेच काय नाकपुड्यांचे स्नायूही त्यासाठी वापरावे लागतात. जणू कुणीतरी नाक आणि तोंड दाबलेय! कुठून हवा येणार? कुठून ऑक्सिजन मिळणार? अशी अवस्था,

तर असे हे पेशन्ट, ऑक्सिजनसाठी क्षणक्षण तडफडणारे. त्यांची अवस्था बघवत नाही; त्यांना त्यांचे हाल सोसता सोसवत नाहीत. बाहेर हवा आहे; ऑक्सिजन आहे. पण तो योग्य तेवढा फुफ्फुसात शिरत नाही. फुफ्फुसांचा दगड झालाय न्यूमोनिया झालाय किंवा फुफ्फुस नावाच्या हवेच्या पिशवीला कातरणारा टी.बी. झालाय. किंवा ह्याच हवेच्या पिशवीला दाबणारे 'प्लुरल इफ्युजन' नावाचे पाणी किंवा 'एम्पायमा' नावाचा पू फुफ्फुसाच्या बाहेरील आवरणात दाटलेला असतो. जीव गुदमरून टाकणारे हे आजार. ऑक्सिजन वेळेवर लावला नाही तर जिवंतपणी मरण म्हणजे काय ते तेच जाणोत ! तेच सहन करू शकतात. नुसता तडफडणारा जीव ! पाण्यावाचून माशासारखा, ऑक्सिजनवाचून माणसासारखा !

पेशन्टच्या डोक्याकडचा कॉटचा भाग. त्यावर ठेवलेली लोखंडी कमान -त्या कमानीवर पाठ व मान ठेवून ऑक्सिजनसाठी धडपडणे म्हणजे काय असते हे त्या मानेला आणि त्या माणसालाच ठाऊक !

……..

…….

आता वार्डच्या अगदी दुसऱ्या कोपऱ्यात बघा. खंगलेले, काळेनिळे झालेले, इजिप्तच्या ममीसारखे देह झालेले रुग्ण कॉटवर झोपवलेत. एड्सने घेरलंय त्यांना. मुख्यतः २० ते ३० वयोगटातले रुग्ण आहेत हे. क्वचित एखादा ६०-७० चा. हा तसा अस्पृश्य भाग. इथे तसे फारसे कुणी फिरकत नाही. फिरकलेच तर रुग्णाला स्पर्श करण्याचे टाळतात. स्पर्श केलाच तर ग्लोव्हज् घालून, मास्क वापरून. एखादा सन्माननीय अपवाद असतो, नाही असे नाही. बाकींच्या दृष्टिकोनातून ते अस्पृश्य - अस्पृश्यच ते !

कुणाला वारंवार संडास लागले आहे कित्येक महिने कित्येक वर्षांपासून. कुणाचा तापच हटत नाही. कुणाच्या पोटात, छातीत, मणक्यात, मेंदूत पाणी झालेय. कुणाला टी.बी. झालाय. कुणाचे शरीरच खंगतेय. नुसता हाडांचा सापळा. मांस खरडलेय हाडाना. असे दिसतात ममीफाईड बॉडी! नाना प्रकार.

यांच्या सेवेशी तसे फुटकळ नातेवाईक. चार हात लांब राहून बोलणारे.

मॅरिड रुग्णांची बायको मात्र सदोदित सेवेला हजर असणारी, 'माझ्या नवऱ्याला वाचवा' म्हणून अजिजणारी, धडपडणारी. हाताला ग्लोव्हज् वा तोंडाला मास्क असलं काही न वापरता सेवाशुश्रूषा करणारी. दुर्गंधाने माखलेल्या बेडखाली, बेडजवळ बसून राहणारी किंवा रात्री-बेरात्री जीव थकला की तिथेच घाणीत झोपणारी. तिच्यासाठी जीव हळहळतो !

आश्चर्याची बाब म्हणजे त्यातल्या बऱ्याच बायका एचआयव्ही निगेटीव्ह । त्यांच्या शरीरात एचआयव्हीचा व्हायरस नाही. नवऱ्याच्या मात्र शरीरात एचआयव्ही. त्याने मौजमजा केली, गुण उधळले म्हणून त्याला एचआयव्ही. हे कळूनही त्या बिचाऱ्या त्यांच्यासाठी राबतात. भारतीय नारी तुम्ही ग्रेट !

इथले एड्सग्रस्त जिणे आणि मृत्यू दोन्हीही अपमानास्पद, लाजीरवाणे, नो सिम्पथी अ‍ॅट ऑल.

…..

…..

आता इथून थोडे बाहेर या. वार्डच्या दरवाजा लगत काही बेड आहेत. पांढरे फटफटीत. नखांचे चमचे झालेले, केसही पांडुरके धुरकटलेले. मक्याच्या केसासारखे भुरके. क्वचित डोळ्याभोवती काळी वर्तुळे. हातांच्या पेरांच्या मागच्या बाजूस काळी मेहंदी लावल्यासारखे डाग नकल पिग्मेंटेशन. ओठांच्या कोपऱ्यात जखमा, जीभ टकली बाल्ड किंवा त्यावर जखमांचे भूखंड जिऑग्राफीकल टंग. पूर्ण निस्तेज माणसे. केविलवाणी. आता मरतील की मग मरतील अशी. चार दोन पावले टाकली तरी धापतात. मटकन खाली बसतात किंवा चक्कर येऊन कोसळतात. पूर्वीपेक्षा दुपटीने पांढरी फिक्क पांढरी फटक पडतात. पांढरी जीभआपसुक बाहेर येतेच. डोळेही पांढरे केलेले असतातच. पण्डुरोग तो हा.

कुणालाही कणव येईल अशी यांची अवस्था.

इथे दोन दृश्ये कायम दिसतात.

दृश्य एक. काळे लालभडक रक्त असलेल्या रक्ताच्या बाटल्या. ते काळे भडक रक्त शरीरात चढविले जातेय. कधी तरी रिअॅक्शन येऊन हुडहुडणारा, धडधडणारा रुग्ण. अंगभर गांध्या येऊन सुजलेला रुग्ण. क्वचित तडतडून मरतो अशी रुग्णांची पोट्रेटस् नेहमी इथे तयार होतात.

दृश्य दोन.

कधी कधी रक्त का कमी झाले कळत नाही. निदानच लागत नाही. मग छातीच्या हाडाच्या मगजामधून मगजमिश्रित रक्त किंवा खुब्याच्या हाडामधून हाडाचा एक टवका तपासणीसाठी काढला जातो. त्याला बोन मॅरो अ‍ॅस्पिरेशन किंवा बोन मॅरो बायॉप्सी असे म्हणतात.

ही तपासणी करताना त्या जागी भूल दिली जाते. तरीही रुग्णाचे हाल होतेच. रुग्ण अगदी गुरासारखा ओरडतो. बॉब ठोकतो. तडफडतो.

खरे तर बोन मॅरो नव्हें बोंब मारो अ‍ॅस्पिरेशन (बायॉप्सी) असेच म्हणायला हवे. वेदनादायकच हा प्रकार, परंतु निदान करण्यासाठी, पेशन्टचा जीव वाचविण्यासाठी हे करणे भागच असते. असो.

आता आणखी काही गोष्टी सांगायला हव्यातच. तर हे एवढेच आजार नाहीत इथे भेटणारे, आणखी भरपूर आहेत. मलेरिया, टायफॉईड, हगवणीचे प्रकार, काविळीचे आजार, तापाचे असंख्य प्रकार आजारः हृदय, मेंदू, पोट, मज्जारज्जू, त्वचा, सांधे, डोळे, नाक, कान, घसा, दात.... कशाकशाचे म्हणून सांगावे.

हे कमी म्हणून की काय आंतरग्रंथींचे आजार आणि हो राहिलेच. कॅन्सर ! विविध अवयवांचे कॅन्सर, रक्ताचा कॅन्सर, तर यांचेही रुग्ण इथे अ‍ॅडमिट असतात. जिथे बेड मिळेल तिथे किंवा जमिनीवर गादी टाकून. त्यामुळे या आजारांचे रुग्ण इतस्ततः विखुरलेले असतात. यांचीही संख्या प्रचंड असते. फक्त ते विखुरलेले असतात एवढेच.

कॅन्सरचा आजार तसा जीवघेणाच. निदान होते तेच मुळी अगदी उशिराने. त्यानंतर त्यावरील उपचार म्हणजे रोग परवडला, असे म्हणण्याची पाळी. उपचार प्रचंड महागडे. शस्त्रक्रियेचे उपचार म्हणजे कॅन्सरग्रस्त अवयव कुरतडणे किंवा तो अवयवच काढणे. विरुपता, विद्रूपता ठरलेली.

पहा औषधोपचार म्हणजे केमोथेरपी शरीरातल्या कॅन्सरच्या पेशी औषधाने मारणे. वाळल्याबरोबर ओलेही जळते तसे कॅन्सरच्या पेशीबरोबर नॉर्मल पेशीही मारल्या जातात.

रेडोओथेरपी म्हणजे कॅन्सरग्रस्त अवयव जाळणे.

जीवन केविलवाणे! उपचाराने शरीराचे होरपळणे आणि मृत्यू वेदनादायक,

मृत्यू सहज, पुन्हा जिवंतपणा दुर्लभ !

कॅन्सरच्या मृत्यूचे एक बरे असते. लोक हळहळतात, फारच हळहळतात. सिम्पथी भरपूर, जीवन कृतार्थ वाटावे असा मृत्यू !

तर हा मेल मेडिकल वार्ड, इथे प्रत्येक भिंतीवर, कोपऱ्यात, दारात, वाराबाहेर, बसल्या ठिकाणी, झोपल्या ठिकाणी, खायच्या जागी पिचकाऱ्या दिसतील, पानाच्या, गुटख्याच्या. तंबाखूच्या.

अत्तराचे वास असतील तसेच दारूचे, माव्याचे भपकारेही असतील.

आजारांनी - आजाऱ्यांनी, माणसांनी गजबजलेला वार्ड. डॉक्टर, नर्स, वार्डबॉय, वार्ड आया यांचा जीव जातो इथे सेवा देताना. जीव मेटाकुटीला येतो. पायाला चाके लावून फिरावे लागते वार्डभर. तरीही तक्रारी चालूच राहतात पेशन्टकडून, नातेवाईकांकडून. समाधानच होत नाही त्यांचे.

हलगर्जी करतात 

लक्ष देत नाहीत 

खिदळत असतात 

कुणाचा पायपोस कुणास नाही 

शिकावू डॉक्टरच बघतात

 त्यांना काय कळते? 

आमचा माणूस तुमच्या निष्काळजीपणामुळे गेला

 बघून घेतो. सोडतच नाही कुणाच्या बाला 

आमचा तळतळाट लागल्याशिवाय राहणार नाही.

…..

…..

असे शेरे. अशा धमक्या. नेहमीच ऐकायला मिळतात. अगदी वरपर्यंत तक्रार होते. पेपरमध्ये छापले जाते. विपर्यस्त बातम्या येतात. वातावरण ढवळून निघते. स्टाफमध्ये भीती. डॉक्टरांमध्ये दहशत. बरेचसे.

रुग्ण अ‍ॅडमिट होतच राहतात. तेच ते पुन्हा पुन्हा घडत राहते. इतिहास घडत राहतो. 'बि'घडत राहतो. रणांगण तेच. पात्रे बदलतात. गात्रे बदलतात.

पुन्हा तेच

पळापळ, गडबड गोंधळ

धुमश्चक्री.

धुमाकूळ.

---

आदिम दु:खाचे मुक्तिस्थानक हॉस्पिटल, डॉ. रवींद्र श्रावस्ती,नाग-नालंदा प्रकाशन,प्रकाशक-त्र्यंबकेश्वर मिरजकर.

नमस्कार वाचकांनो.

आपलं या पुस्तक प्रवासात स्वागत.वरील पुस्तक क्रमशः प्रकाशित करीत आहे.विजय गायकवाड.



8/10/26

सातेरी आई आणि वेताळ बाबा/Sateri Ai and Vetal Baba.

सातेरी आई डोलत होती वाऱ्यामंदी। 

आम्ही तिची पुरी केली नाकेबंदी। 

सातेरी आई न्हात होती पावसामंदी। 

आम्ही तिला राउळ बांधले चिरेबंदी ।। 

वेताळ बाबा शेकत होता उन्हामंदी। 

त्याला पार झाकुन टाकला सावलिमंदी। 

खुशिमंदी नाचत होता पावसामंदी। 

आम्ही त्याला गाडुन टाकला देवळामंदी।।

मी जिथे जन्मलो त्या पुण्यातल्या सर्वोच्च स्थानावर वेताळ बाबा आरूढ आहेत.त्यांच्या कृपाछत्राखाली, त्यांच्या टेकडीवर भटकत भटकत मी वाढलो.आमचा मूळ गाव आहे गोव्यात.तिथल्याही गावा-गावांत वेताळ बाबा राहतात,जवळपास सोबतीला असते सातेरी आई, दोघेही स्वयंभू,सातेरी वसतीला असते वारुळांत,तर वेताळबाबा एखाद्या सुळक्यासारख्या शिळेत.सातेरी धरणीमातेची योनी आहे तर वेताळ लिंग.निसर्गाच्या प्रसवशक्तीची प्रतीके,त्यांच्या संगमातून सारी जीवसृष्टी उद्भवली.सातेरी वेताळांनी नेहमीच मोकळ्यावर निसर्गाच्या सान्निध्यात खुलावे.त्यांची रावळे देवळे कधीच बांधू नयेत.खरे तर साऱ्याच जीवजातींनी खुलेपणे निसर्गातली आपापली भूमिका वठवत 'वसुधैव कुटुंबकम्' अशा भावनेने नांदावे.पण हळूहळू मानवाची आणि परिसराची नाळ तुटली आहे.त्याला सगळ्याभोवती काहीतरी कृत्रिम वेष्टन घालायची खोड पडली आहे.तेव्हा आता सातेरी वेताळांना तो मोकळ्यावर,डोंगरमाळांवर,वनकाननांत राहू देत नाही. खणाखणी,तोडफोड करत त्यांच्या अवतीभोवती दगड, विटा,चुना,सिमेंट,पोलादाचे इमले रचतो.हे सगळे साहित्य जुळवण्यासाठी आणखी नासधूस करतो. मूळच्या वारुळांना शिळांना पार गाडून टाकतो.

मनमोर

पण सतत बांधकामात गढूनही मानवाचे निसर्गप्रेम काही पूर्णपणे आटलेले नाही.लहानपणी मी वेताळाच्या डोंगरावर मनमुराद हिंडायचो,तेव्हा बरोबर असायचा माझा एक आणि आमच्या शेजाऱ्यांचे तीन,असे चार कुत्रे राजा,टिपू,गोट्या आणि पिंग्या.वेताळाच्या आसपास फारसे कोणी भेटायचे नाही.कारण डोंगराच्या अवती-भोवती सगळी शेती होती,आणि गवळ्यांची वस्ती.आमच्या घरासारखी अगदी मोजकी घरे.एखाद वेळी भटक्या जमातींतले दोन-चार शिकारी भेटायचे. म्हणायचे,तुझ्याकडे चार कुत्री आहेत.आम्हाला दे की त्यातली एक-दोन ! लहानपणापासून मला पक्षी बघायचा नाद होता.तेव्हा डोंगरावर भरपूर सातभाई, चंडोल,होले,लावे,तित्तर,खाटीक,ससाणे होते; पण ह्या शिकाऱ्यांच्या फेऱ्यांत मोर टिकणे शक्य नव्हते.नंतर चाळीस वर्षे पुण्याबाहेर काढून परतलो.आपसूकच माझी पावले वेताळाच्या डोंगराकडे वळली.वेताळाला आता देवळात झाकलेले पाहून जरा हळहळलो.पण अवती-भोवतीचे दृश्य पाहून माझ्या मनमोराचा पिसारा अक्षरशः फुलला,कारण आज इथे चिक्कार मोर बागडताहेत.मधे एक बातमी होती की ह्या परिसरात मोरांना पकडायचे सापळे नजरेस आले.सजग पक्षीमित्रांनी ते हुडकून हुडकून मोर वाचवले.जसजशी डोंगराभोवतीची वस्ती वाढली,जसजसे जास्तीत जास्त लोक टेकड्यांवर फिरायला लागले,तसतसे त्यांच्या जागरूकतेतून मोरांना संरक्षण मिळू लागले.वृक्षराजी पण फोफावली.ह्या टेकड्यांवर बांधकामे अजिबात नकोत म्हणून हे नागरिक लढताहेत.हा पुण्यातलाच नाही,तर जगभरचा अनुभव आहे.निसर्गाचे मनापासून रक्षण केले आहे लोकांनी - धनदांडग्यांशी आणि त्यांच्या गळ्यात गळे घालणाऱ्या सत्ताधीशांशी भांडत-भांडत. आपल्या भारतभूत जसे अनेक जागरूक निसर्गप्रेमी आहेत तसेच अमेरिकेतही.अशा एका तरुण निसर्गप्रेमीची लढत हेच आहे वारूळ पुराण या पुस्तकाचे सूत्र.

वारूळ पुराण

पर्यावरणाची,निसर्गाच्या सुरक्षेची वारूळ पुराणाच्या लेखकांना एड् विल्सनना मोठी कळकळ आहे. आधुनिक जगातल्या उलथापालथी निसर्गावर प्रचंड आघात करताहेत,हे त्यांना दिसते.तरीही एड् विल्सन हे ह्या उलाढाली घडविणाऱ्या आधुनिक अर्थ-शासनव्यवस्थेचे कट्टर पुरस्कर्ते आहेत. 

'अँटहिल' ही आत्मचरित्रात्मक कादंबरी ह्या द्वंद्वातून त्यांच्या मनात चालू असलेला जो 'आपुलाचि वाद आपणासी'आहे त्याचा मागोवा घेते.कथानायकाचे वंशद्वेषी अलाबामा राज्यातील बालपण,निसर्ग निरीक्षणाची आवड,महाविद्यालयातले कीटकांवरचे शास्त्रीय काम,सगळे जणू एड् विल्सनच्या आयुष्याचे प्रतिबिंब आहे.मग कादंबरीचा नायक रॅफ त्यांच्यासारखाच पदव्युत्तर शिक्षणासाठी हार्वर्डला येतो. तोही निसर्गसंरक्षण आणि 'दिल मांगे मोअर'वाली हव्यासवादी,चंगळवादी,आक्रमक अर्थव्यवस्था यांच्या संघर्षात बुडून जातो.फक्त एड् विल्सन हार्वर्डला येऊन एक ख्यातनाम जीवशास्त्रज्ञ बनतात,तर रॅफ विज्ञान बाजूला ठेवून वकील बनतो आणि एका मोठ्या बांधकाम व्यवसायात शिरून त्याच्या पुढचा तिढा सोडवतो.माझ्याही आयुष्यात असे बरेच काही घडले आहे.मला पण बालपणी निसर्ग निरीक्षणाची गोडी लागली,मीही पदव्युत्तर शिक्षणासाठी हार्वर्डला गेलो. त्या वेळी व्हिएटनामच्या युद्धाने अमेरिका ढवळून निघाली होती;हार्वर्ड विद्यापीठात विद्यार्थ्यांची युद्धविरोधी मोहीम जोरात होती.रॅफसारखा मीही अशा सगळ्या वादविवादांत रंगून गेलो.नंतर जन्मभर भारतात निसर्गरक्षण आणि आर्थिक विकास यांच्या संघर्षातून तोड कशी काढावी या समस्येशी झगडत राहिलो.म्हणून नंदा खरेंनी,'तू या अँटहिलच्या अनुवादाला दीर्घ प्रस्तावना लिही' म्हटल्यावर खूप खुललो.

इलियड

अँटहिल पुस्तकाची सुरुवात होते होमरच्या इलियडमधल्या एका अवतरणाने ! जन्मल्यापासून मरेपर्यंत एकमेकांना रक्तबंबाळ करत मानवाची यातनामय जीवनगाथा उलगडत राहावी ही तर ईश्वरेच्छा आहे.जीवन म्हणजे एक संघर्ष आहे,बळी तो कान पिळी हा तर जगाचा नैसर्गिक न्याय आहे,उत्क्रान्तीचा परिपाक आहे,अशी एक विचारधारा आहे.ह्याला म्हणतात सामाजिक डार्विनवाद.जगात आज अग्रगण्य समजले जाणारे उत्क्रान्तिशास्त्रज्ञ विल्सन ह्याच विचारधारेचे पुरस्कर्ते आहेत.कट्टर उजव्या पंथाच्या राजकीय नेत्यांशी त्यांची दोस्ती आहे.विल्सनच्या बुद्धीचा फेरा चौफेर चालतो.त्यांनी उत्क्रांतिशास्त्र,सामाजिक शास्त्रे आणि धर्म ह्यांच्या परस्परसंबंधांवरचे एक पुस्तक लिहिले आहे.पण त्या पुस्तकातल्या विवेचनातला धर्म म्हणजे केवळ येशू ख्रिस्ताचा धर्म.मी त्यांना म्हटले,अहो ह्यात तुम्ही मांडलेल्या अनेक संकल्पनांचा गौतम बुद्धाने खोलवर विचार केला आहे,त्यावर मांडणी केली आहे. तुम्हाला कशी कल्पना नाही? ते म्हणाले.खरे आहे मी धर्माबद्दल खूप लिहिले पण मला माझ्या ईसाई धर्माखेरीज कशाचीही जाण नाही. जीवनात जबरदस्त संघर्ष आहे तसाच सहकारही.आजपावतो उत्क्रांती शास्त्रातले बहुतांश प्रतिपादक एकांगी,रात्रंदिन जीवांना युद्धाचा प्रसंग,अशा संघर्षाच्या भूमीवर भर देऊन सहकाराकडे दुर्लक्ष होत आले आहे पण उत्क्रांती वादाच्या प्रमुख उद्गात्याचा चार्ल्स डार्विनचा दृष्टिकोन असा संकुचित नव्हता.त्याने जीवसृष्टीतला संघर्ष कसा उद्भवतो ह्याचे सुस्पष्ट निरुपण केले.पण ह्याबरोबरच डार्विनला जीवसृष्टीत सहकार्य आहे,परोपकारही आहे, आणि त्याचा मुलस्तोत्र काय आहे हे कोडे सोडवणे  अत्यावश्यक आहे हेही जाणवत होते.म्हणूनच तो आवर्जून म्हणतो की,मुंग्या,मधमाशांच्या संघातल्या श्रमिकांच्या परोपकारी जीवनशैलीचा उलडडा करणे हे उत्क्रांतीशास्त्रापुढचे एक महत्त्वाचे आव्हान आहे.

निसर्ग निवड

डार्विनने उत्क्रान्तीला दिशा देणाऱ्या,गती देणाऱ्या प्रक्रियेचा उलगडा करून दाखवला.ही आहे निसर्ग निवडीची - natural selection ची प्रक्रिया.ही प्रक्रिया कुठे कुठे अपेक्षित आहे ? जिथे जिथे पुनरुत्पादन असते व त्यातून ज्या नव्या आवृत्त्या,नकला,प्रती बनतात त्या बहुतांश मुळासारख्याच असल्या तरी अधूनमधून त्यांच्यात थोडे फार तरी बदल घडत असतात आणि मग अशा बदललेल्या प्रतींच्यात जी वेगळी गुणवैशिष्ट्ये निर्माण होतात,त्यांचा त्या प्रती तगण्यावर,फळण्यावर परिणाम होऊ शकतो,तिथे तिथे. थोडक्यात म्हणजे प्रजनन,आनुवंशिकता आणि अखंड वैविध्यनिर्मिती ह्यांच्या त्रिवेणी संगमातून निसर्गात अहोरात्र निवडीची प्रक्रिया चालू राहते,आणि त्या प्रक्रियेतून एक अफाट वैविध्याने नटलेली सृष्टी उभारली जाते.ही सृष्टी त्रिविध आहे : प्रथम अस्तित्वात आलेली जीवसृष्टी आणि तिच्या जोडीलाच क्रमाने अवतरलेली मानवनिर्मित कल्पसृष्टी व कृत्रिम वस्तुसृष्टी.सगळ्या कल्पसृष्टीच्या मुळाशी असलेल्या शब्दांचाच विचार करा.मुले आईच्या शब्दांच्या नकला करतात,त्यांना नवे आयुष्य देतात,वापरता वापरता शब्दांत बदल होत राहतात,आज चलती असलेले भारनियंत्रणासारखे शब्द फोफावतात,तर तोच अर्थ अधिक स्पष्ट करून सांगणारे वीजकपातीसारखे शब्द लयाला जातात. 

Satericha Wada Zala Chirebandi | Madhav Gadgil,सातेरीचा वाडा झाला चिरेबंदी। माधव गाडगीळ Varul Puran | E. O. Willson.Sankshipta Anuwad: Nanda Khare

वारूळ पुराण । ई. ओ. विल्सन

संक्षिप्त अनुवाद । नंदा खरे

प्रकाशक । अरविंद घनःश्याम पाटकर, 

जीवसृष्टीसारखी शब्दसृष्टीही सतत नवनवी रूपे घेत वाढत राहते.तसेच कृत्रिम वस्तूंचे.मोबाईल फोनांच्या प्रती सारख्या बनवल्या जातात,त्यांच्यात सारखे बदल होत राहतात,वस्तुसृष्टीही सतत नवनवी रूपे घेत वाढत राहते.जीवसृष्टी,कल्पसृष्टी आणि वस्तुसृष्टी ह्या त्रिविध सृष्टींचे वेगवेगळे आविष्कार आपले विश्व घडवत राहतात.अँटहिल कादंबरीत ह्या तीन विश्वांचा खेळ डोळ्यासमोर आणला आहे.

राहिलेला भाग पुढील लेखामध्ये…!