एखाद्या आण्विक प्रक्रियांच्या साखळीप्रमाणे स्फोटकपणे कार्य करीत दुसऱ्या लाटेने आजवर एक असलेली जीवनाची दोन अंगे फोडून बाजूला केली. असे करीत असताना तिने आपल्या अर्थकारणात, आपल्या मानसात, फार काय, आपल्या लैंगिक व्यक्तित्वातही एक फार मोठी अदृश्य पाचर ठोकून ठेवली.
औद्योगिक क्रांतीने एका अप्रतिमपणे एकसंध असलेला असा समाज आपल्या वैशिष्ट्यपूर्ण तंत्रज्ञानाद्वारे, आपल्या खास सामाजिक संस्थांद्वारे आणि आपल्या माहिती पद्धतींद्वारे कार्य करीत निर्माण केला. परंतु दुसऱ्या पातळीवर तिने आर्थिक तणाव, सामाजिक संघर्ष आणि मानसशास्त्रीय कासावीस यांनी ठासून भरलेली जीवनपद्धती निर्माण करून समाजाच्या अस्तरातील ऐक्य टरकावून बाजूला केले.
आपल्याला दुसऱ्या लाटेच्या युगामध्ये या अदृश्य पाचरीने आपले जीवन कसे घडवले हे समजले, की आकार घेत असलेल्या तिसऱ्या लाटेच्या आघाताच्या आवेगाचे आकलन होऊ शकेल.
मानवी जीवनाचे ह्या दुसऱ्या लाटेने केलेले दोन विभाग म्हणजे उत्पादन आणि वापर, विनियोग.
उदाहरणार्थ, आपल्याला नेहमी वाटत असते की आपण उत्पादक आहोत, तसेच ग्राहकही आहोत. परंतु नेहमी हे खरे असत नाही. औद्योगिक क्रांतीच्या अगोदर मानवाने निर्माण केलेले विपुल अन्नधान्य, तयार केलेल्या वस्तू आणि सेवा या गोष्टी खुद्द उत्पादक आणि त्यांच्या कुटुंबियांकडूनच वापरल्या जात होत्या किंवा श्रेष्ठ लोकांचा वर्ग या गोष्टींचा अवशेष स्वतःच्या वापरासाठी बळकावत असे.
बहुतेक शेतीप्रधान समाजात लोकांचा फार मोठा वर्ग शेती करत होता. छोट्या आणि काहीशा एकाकी गटांतून राहत होता. हे लोक गरजेपुरतेच अन्न निर्माण करत होते, स्वतःला जिवंत ठेवण्यात यश मिळवत होते. आपल्या जमीनदाराला खूश ठेवण्यातही यश मिळवत होते.
कितीतरी काळ अन्नधान्य साठवणीच्या सुविधा त्यांच्याकडे नव्हत्या. आपले उत्पादन बाजारापर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांच्याकडे रस्ते नव्हते. त्यांना माहीत होते की जास्त उत्पादन केले, तर सरंजामदार किंवा गुलामांचे मालक ते आपले हडप करतील. त्यामुळे आपले उत्पादनतंत्र सुधारण्याच्या किंवा उत्पादन वाढवण्याच्या बाबतीत ते उदासीन होते.
अर्थात् व्यापार तेव्हाही होता. आपल्याला माहीत आहेच, की काही धाडसी व्यापारी उंट, गाडी किंवा नौका यांच्यावर आपला माल लावून हजारो मैल तो नेत होते. ग्रामीण भागातून येणाऱ्या अन्नधान्यावर अवलंबून असलेली शहरे निर्माण होत.
इ. स. १५१९ मध्ये मेक्सिकोत पोहोचणाऱ्या स्पेनवासियांना स्टॅटेलोल्कोमध्ये हजारो लोक रत्ने, मौल्यवान धातू, गुलाम, सॅन्डल्स, कापड, चॉकलेट, दोर, कातडी, टर्की, भाजीपाला, ससे, कुत्री आणि हजारो प्रकारची मातीची भांडी यांची खरेदी-विक्री करत असलेले पाहून आश्चर्याचा धक्का बसला.
जर्मन बँकर्ससाठी निघालेल्या १६व्या व १७व्या शतकातील खाजगी वितरणातील वृत्तांत, दि फुग्गर न्यूज लेटर, त्या काळच्या व्यापाराचे विविधरंगी स्वरूप दाखवितो. भारतातील कोचीनमधील एका पत्रात युरोपात पाठविण्यासाठी मिरी खरेदी करायला पाच जहाजे घेऊन आलेल्या एका युरोपीय व्यापाऱ्यावर चाललेल्या खटल्याची सविस्तर हकीकत आली आहे.
तो म्हणतो, की, “मिरीचा व्यापार हा एक उत्तम धंदा आहे; फक्त त्यासाठी उत्साह आणि चिकाटी यांची आवश्यकता आहे.”
हा व्यापारी लवंगा, वेलदोडे, जायफळ, जायपत्री, कणिक, काही औषधे युरोपीय बाजारात नेत असे.
तरीदेखील, शेतीमजुरांनी ताबडतोबीच्या स्वतःच्या वापरासाठी केलेल्या उत्पादनाच्या प्रमाणात हा व्यापार म्हणजे एका तत्त्वाचे केवळ चिन्हच म्हणावे लागेल.
सोळाव्या शतकाच्या उत्तरार्धापर्यंत भूमध्य सागरीय विभागात एका टोकाला स्पेन आणि फ्रान्स व दुसऱ्या टोकाला तुर्कस्तान असलेल्या प्रदेशात ६० ते ७० दशलक्ष लोक राहत होते. या लोकसंख्येच्या नव्वद टक्के लोक जमिनीतून येणाऱ्या उत्पादनावर जगत होते. व्यापारयोग्य वस्तूंचे फार थोड्या प्रमाणात उत्पादन होत होते, असे या कालखंडातील इतिहासाचे निर्विवाद निष्कर्ष काढणारे संशोधक फर्नाँ ब्रॉडेल यांचे म्हणणे आहे.
ते आणखी म्हणतात, “भूमध्य सागरीय भागातील एकूण उत्पादनाच्या साठे किंवा सत्तर टक्के उत्पादन बाजारीय अर्थक्षेत्रात कधी आलेच नाही.”
या क्षेत्रातली ही स्थिती, तर उत्तर युरोपातली काय असेल? खडकाळ जमीन आणि अतिथंड दीर्घ हिवाळे, तिथल्या जमिनीतून शेतकऱ्यांना कितीसे उत्पादन काढू देत असतील? आणि तेही किती कष्टाने!
औद्योगिक क्रांतीच्या पूर्वीच्या पहिल्या लाटेच्या आर्थिक स्थितीचे आपल्याला जर नीट आकलन झाले, तर दोन वेगळे भाग धारण करणाऱ्या तिसऱ्या लाटेचे आकलन सोपे होईल.
‘अ’ विभागात लोक स्वतःच्या उपयोगासाठी उत्पादन काढीत असत, तर ‘ब’ विभागाचे लोक उत्पादन, व्यापार किंवा वस्तूंची अदलाबदल करून करावयाच्या खरेदी-विक्रीसाठी करत असत.
‘अ’ विभाग खूप विस्तृत होता. बहुतांश लोकांसाठी उत्पादन आणि वापर या गोष्टी एका जीवनदायी प्रक्रियेत एकत्र गुंफलेल्या अवस्थेत होत्या. ही एकात्मता इतकी पक्की होती, की ग्रीक, रोमन आणि मध्ययुगीन युरोपीय दोहोंतला फरक करत नव्हते. एवढेच नव्हे, तर ‘ग्राहक’ हा शब्दही त्यांच्या भाषेत नव्हता.
पहिल्या लाटेच्या संपूर्ण युगात लोकसंख्येचा अगदीच लहान भाग बाजारावर अवलंबून होता. बहुतेक लोक त्याच्या बाहेरच असत.
दुसऱ्या लाटेने झटक्यात ही स्थिती बदलून टाकली.
अत्यंत स्वयंपूर्ण लोक किंवा समाज यांच्या जागी तिने इतिहासात पहिल्यांदाच अशी स्थिती निर्माण केली, की मोठ्या प्रमाणातील संपूर्ण, सर्व प्रकारचे अन्नधान्य, वस्तू आणि सेवा या विक्री, अदलाबदल आणि देवाण-घेवाण यांच्या कक्षेत गेल्या.
खुद्द स्वतःच्या किंवा कुटुंबाच्या वापराच्या वस्तू निर्माण करण्याची पूर्वीची कल्पनाच तिने पूर्णतः नाहीशी करून टाकली. आणि अशी एक वेगळीच संस्कृती निर्माण केली, की जिच्यात कोणीही, अगदी शेतकरीदेखील, इथून पुढे कधीच स्वयंपूर्ण होऊ शकणार नाही.
अन्न, वस्तू आणि सेवा यांच्या बाबतीत प्रत्येकजण पूर्णतः दुसऱ्या कोणावर तरी अवलंबून राहण्याची वेळ आली.
थोडक्यात, औद्योगिकीकरणाने उत्पादन आणि वापर यांची एकी फोडली. उत्पादकापासून ग्राहक वेगळे फोडले. पहिल्या लाटेची एकसूनी अर्थव्यवस्था ही दुसऱ्या लाटेत भेगाळलेली अर्थव्यवस्था बनून गेली.
बाजाराचा अर्थ
या पद्धतीचे परिणाम महत्त्वाचे ठरले. तरी आपल्याला ते क्वचितच समजतात.
एकेकाळी एक छोटे किंवा वर्तुळाबाहेरचे ठरेल असे बाजार हे तत्त्व म्हणजे जीवन झपाटून टाकणारे एक झंझावाती वादळ बनून राहिले आहे. अर्थकारण ‘बाजारी’ बनून गेले. आणि ही गोष्ट समाजवादी व भांडवलवादी दोन्ही प्रकारच्या औद्योगिक अर्थकारणाच्या बाबतीत घडली.
पाश्चात्त्य अर्थशास्त्रज्ञांचा कल, बाजार ही जीवनाची पूर्णतः भांडवलशाही बाब आहे असे मानण्याचा आहे. त्यातूनही हा शब्द ते ‘फायद्याचे अर्थशास्त्र’ याचा समानार्थी म्हणून वापरतात.
तरीदेखील इतिहासाच्या अभ्यासाने आपल्याला हे कळते, की देवाण-घेवाण म्हणजेच बाजाराची जागाही फायद्याच्या अगोदर, त्याच्याहून स्वतंत्रपणे अस्तित्वात आली होती.
कारण स्पष्टच सांगावयाचे तर बाजार म्हणजे देवाण-घेवाणीचे जाळे. जणू तो एक स्विचबोर्डच. त्याच्यामार्फत वस्तू वा सेवा संदेशांप्रमाणे त्यांच्या योग्य स्थळी नेऊन पोहोचवतो. तो काही मुळात भांडवलशाही नाही.
असा स्विचबोर्ड फायद्याच्या उद्दिष्टाने प्रेरित झालेल्या औद्योगिकतेला जसा आवश्यक आहे, तसाच समाजवादी औद्योगिक समाजासाठीही आवश्यक आहे.
थोडक्यात, जिथे म्हणून दुसऱ्या लाटेने प्रभाव पाडला, तिथे उत्पादनांचे उद्दिष्ट वापरापेक्षा अदलाबदल हे ठरले. आणि ही अदलाबदल अमलात येण्यासाठी यंत्रणेची आवश्यकता होती. बाजाराची आवश्यकता होती.
बाजार उदासीन, अक्रियाशील असून उपयोग नव्हता. अर्थशास्त्रीय इतिहासाचे अभ्यासक कार्ल पोलान्यी यांनी असे दाखवून दिले आहे, की पूर्वी जो बाजार समाजांच्या सामाजिक किंवा आर्थिक, सांस्कृतिक उद्दिष्टांपुढे गौण ठरला होता, तोच नंतर औद्योगिक समाजांचे प्रमुख उद्दिष्ट ठरला.
पुष्कळ लोक चलन-मूल्यांकन प्रणालीत खेचले गेले. व्यापारी मूल्ये केंद्रस्थानी आली. सरकारे समाजवादी असोत की भांडवलवादी, त्यांचे मुख्य उद्दिष्ट ठरले—आर्थिक भरभराट.
कारण बाजार ही एक विस्तार पावणारी, स्वतःला मजबूत ठेवू शकणारी संस्था होती. अगदी सुरुवातीच्या श्रमविभागणीने व्यापाराला प्रोत्साहन दिले होते, त्याप्रमाणे आता बाजाराचे केवळ अस्तित्वच उलट अधिक श्रमविभागणीला प्रोत्साहन देऊ लागले. आणि त्यायोगे उत्पादकतेत प्रचंड वाढ झाली.
स्वतःच विस्तृत पावणारी एक प्रक्रिया कार्यान्वित झालेली होती.
बाजाराचा हा स्फोटक विस्तार जगाच्या ध्यानीमनी नसतील अशा राहणीमानाच्या उंचीला वेगाने उंचावण्याला साहाय्यभूत ठरला.
राजकारणात मात्र उत्पादन आणि वापर यांच्या भेदातून निर्माण झालेल्या नवीनच प्रकारच्या संघर्षामुळे दुसऱ्या लाटेतील सरकारे अधिकाधिक व्यथित होत गेलेली आढळली.
मार्क्सवाद्यांनी वर्गकलहावर जो भर दिला, त्यामुळे उत्पादकांच्या—कामगार व व्यवस्थापक दोघांच्याही—अधिक पगाराच्या, अधिक फायद्याच्या आणि अधिक नफ्याच्या मागण्यांमध्ये आणि ग्राहकांच्या [यात खुद्द तेच लोकही असतात] कमी दरांच्या मागण्यांमध्ये उद्भवलेला अधिक मोठा, अधिक खोल संघर्ष झाकून गेला.
आर्थिक धोरणाचा काटा दोन्ही तरफेच्या या टेकूवरच झुलत राहिला.
अमेरिकन संयुक्त संस्थानात झालेली ग्राहक चळवळीची वाढ, नुकत्याच सरकारने कमी केलेल्या किमतींच्या वाढीविरुद्ध झालेल्या उठावांमध्ये, ब्रिटनमध्ये अखंड चालू असलेले दरांबाबतचे आणि मिळकतीबाबतचे वादंग, ग्राहकोपयोगी वस्तूंना की अवजड उद्योगांना प्राधान्यक्रम याविषयीच्या वादाच्या पायाभूत कल्पनांना धरून रशियात चाललेले भीषण झगडे—ह्या सर्व गोष्टी म्हणजे, भांडवलशाही असो की समाजवादी असो, प्रत्येक समाजात उत्पादन आणि वापर यांच्यातल्या फुटीमुळे उत्पन्न झालेल्या मूळ संघर्षाची अंगे आहेत.
केवळ राजकारणातच नाही, तर सांस्कृतिक क्षेत्रातही फरक पडला.
ह्या फाटाफुटीमुळे इतिहासात पहिल्यांदाच पैशांचाच विचार करणारी, लोभी, व्यापारीभूत आणि हिशोबी संस्कृती निर्माण झाली.
दि कम्युनिस्ट मॅनिफेस्टोने नव्या समाजावर केलेल्या आरोपांशी सहमत होण्याला एखादा माणूस मार्क्सवादीच असावा लागतो असे नाही.
“माणसामाणसांत दुवा उरला आहे तो निर्लज्ज स्वार्थीपणाचा, निब्बर ‘रोख फेडणुकीचा’. व्यक्तिगत संबंध, कौटुंबिक बंध, प्रेम, मैत्री, शेजाऱ्यांचे किंवा सामाजिक बंध या सर्व गोष्टी बाजारू स्वार्थात विरघळून गेल्या आहेत; या गोष्टी बाजारू स्वार्थाने भ्रष्ट केल्या आहेत.”
मार्क्सने माणसांच्या ऋणानुबंधात निर्माण झालेला हा अमानुषपणा अचूक ओळखला. पण त्याला त्याने भांडवलशाहीच्या माथी मारले, हे मात्र चूक होते. अर्थात, त्याने हे जेव्हा लिहिले, तेव्हा त्याकाळी त्याला औद्योगिक समाज भांडवलशाही स्वरूपातच दिसला असला पाहिजे.
आता, अर्धशतकाहून अधिक काळ समाजवादावर आधारलेल्या औद्योगिक समाजाचा अनुभव घेतल्यानंतर आपल्याला हे समजून चुकले आहे की, हावरटपणा, व्यापारातील भ्रष्टाचार आणि माणसामाणसांतील ऋणानुबंधातील घट या गोष्टींचा शुद्ध आर्थिक तत्त्वांवर विचार करता त्या काही केवळ भांडवलशाहीच्या मक्त्यातील नव्हेत.
पैसा, वस्तू, पदार्थ यांच्यात असलेला व्यापक विचार पाहता त्यांच्यात भांडवलशाही किंवा समाजवाद यांच्यापेक्षा औद्योगिकीकरणाचेच प्रतिबिंब पडलेले आढळून येईल.
सर्व समाजांमध्ये बाजाराकडे आलेली मध्यवर्ती भूमिका, जिच्यात उत्पादनाची वापराशी फारकत झालेली आहे, जिच्यात प्रत्येक जण आपल्यात असलेल्या जीवनोपयोगी वस्तूंच्या उत्पादनकौशल्यापेक्षा बाजारावरच अवलंबून आहे, तिचे हे प्रतिबिंब आहे.
राजकीय रचना कोणतीही असो, अशा समाजात केवळ वस्तूच आणल्या, विकल्या किंवा बदलल्या जात नाहीत, तर श्रम, कल्पनाशक्ती, कला आणि फार काय, आत्म्यांचाही व्यापार होत असतो!
बेकायदेशीर कमिशन खिशात टाकणारा पाश्चात्त्य एजंट, साहित्य पसंत केल्याबद्दल लेखकाकडूनच उलट काही स्वीकारणारा रशियन संपादक किंवा अगोदरच कामाचा मोबदला असूनही व्होडकाच्या बाटलीची (जादा) मागणी करणारा प्लंबर—हे सगळे एकाच माळेचे मणी.
केवळ पैशांसाठी लिहिणाऱ्या फ्रेंच किंवा अमेरिकन किंवा ब्रिटिश कलाकारांहून, पोलिश, झेक किंवा रशियन कादंबरीकार, चित्रकार किंवा नाटककार वेगळे नाहीत. कारण तेही बोनस, किंवा नव्या गाडीच्या प्राप्तीसाठी प्राधान्य, किंवा इतर अप्राप्य गोष्टी अशा जादा अधिक लाभासाठी आपली कला विकत असतात.
अपुर्ण शिल्लक भाग २ पुढील लेखामध्ये.
📖 स्रोत : तिसरी लाट — Alvin Toffler यांच्या The Third Wave या पुस्तकाचा मराठी अनुवाद.
अनुवादिका : शरदिनी मोहिते
प्रकाशक : महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई