जशी एका समाजांतर्गत एकतर्फी देवाण-घेवाण पोसली गेली,तशीच वेगवेगळ्या समाजांतील व्यक्तींकडून दुसऱ्या समाजाचे शोषणही पोसले गेले.इजिप्तच्या नाईल नदीप्रमाणेच भारतात सिंधू नदीच्या खोऱ्यात हडाप्पा,मोहेंजोदाडो,लोथाल ह्या नगरांच्या आसपास अशाच सुपीक शेतीच्या अतिरिक्त उत्पादनाच्या आधारे मोठ्या प्रमाणावर श्रमविभागणी झालेली समाजव्यवस्था अस्तित्वात आली.
ह्या संस्कृतीचा व्यापार अरबस्थानापर्यंत पसरला होता. ह्या व्यापाऱ्यांचा जमाखर्च नोंदवण्यासाठी एक लिपी पण वापरात आली,पण आजतागायत तिचा अर्थ लावता आलेला नाही,त्यामुळे ह्या संस्कृतीबद्दल आपली माहिती फार तुटपुंजी आहे.इजिप्तमध्ये पिरामिड बांधत होते त्या काळात,चार पाच हजार वर्षांपूर्वी ही संस्कृती भरभराटीला आली होती.सुमारे दीड हजार वर्षांपूर्वी ती खालावत खालावत लयाला गेली.ऱ्हासाला पर्जन्यमानात झालेली घट व त्यामुळे घटलेले अतिरिक्त कृषि उत्पादन जबाबदार होते असा एक अंदाज आहे. पण आणखी एक सुचवले गेले आहे की,मध्य आशियातून आलेल्या वैदिक संस्कृतीच्या लोकांच्या आक्रमणाने मोहेंजोदाडो संस्कृती उद्ध्वस्त झाली.
'वारुळ पुराण',माधव गाडगीळ',ई.ओ.विल्सन,अनुवाद - नंदा खरे,मनोविकास प्रकाशन ) हे समाज प्रामुख्याने पशुपालक समाज होते. त्यांच्यापाशी घोडे होते,लोखंडी हत्यारे होती.त्यांच्या बळावर त्यांनी शेतीप्रधान,स्थिर समाजांवर कुरघोडी केली.अशा युद्धांत दया-माया न बाळगणारे यशस्वी होतात.वैदिक समाजाचा एक नेता होता,इन्द्र.तो असाच निर्दय होता असे दाखवले गेले आहे.इन्द्राचे दुसरे नाव आहे पुरंदर,अथवा शहरे उद्ध्वस्त करणारा.त्याने मोहेंजोदाडो संस्कृती पुरी नष्ट केली अशीही एक शक्यता वर्तवली जाते.
प्रत्येक माणसाच्या अंतर्मनात काही प्रमाणात तरी स्वार्थ आणि परोपकार,हिंसा आणि करुणा,क्रौर्य आणि दया-क्षमा-शांती,
खोटेपणा आणि सच्चेपणा ह्यांच्यात रस्सीखेच,कुतरओढ चालू असते.समाजातही ह्या परस्परविरोधी प्रवृत्तींची स्पर्धा,ह्यांचे द्वंद्व पाहायला मिळते.इन्द्र आणि प्रतर्दनाचा एक संवाद ह्या द्वंद्वाचे चित्रण करतो.दिवोदासाचा पुत्र प्रतर्दन युद्ध करून आणि पराक्रम दाखवून इन्द्राच्या आवडत्या वाड्यांत गेला.त्याला इन्द्र म्हणाला,"हे प्रतर्दना,तुला मी वर देतो." प्रतर्दन म्हणाला, "जो मनुष्याला कल्याणकारक होईल असा वर दे." इन्द्र उत्तरला,"वर दुसऱ्याकरतां घेत नसतात.स्वतःसाठी वर मागून घे." प्रतर्दन "माझ्यासाठी मला वर नको." तेव्हा इन्द्राने सत्य गोष्ट सांगितली. कारण इन्द्र सत्य आहे.तो म्हणाला, "मला जाण.तेच मनुष्याला हितकारक आहे की जेणेकरून मला तो जाणेल.त्वष्ट्याच्या मुलाला त्रिशीर्षाला मी ठार मारले. अरुर्भग नावाच्या यतींना कुत्र्यांकडून खाववले. पुष्कळ तहांचे अतिक्रमण करून दिव्यलोकी प्रल्हादाच्या अनुयायांना,अंतरिक्षांत पौलोमांना आणि पृथ्वीवर कालकाश्यांना मी ठार मारले.त्या प्रसंगी माझा एक लोम देखील वाकला नाही.अशा प्रकारे जो मला ओळखील,त्याने मातृवध,पितृवध,चौर्य,भ्रूणहत्या इत्यादी पापे केली असता किंवा तो करीत असता त्याला भीती वाटणार नाही,किंवा त्याच्या तोंडाचा नूर पालटणार नाही."
खांडववन दहन
इन्द्रकाली,सुमारे तीन हजार पाचशे वर्षांपूर्वी वैदिक संस्कृतीतले समाज सिंधू नदीच्या खोऱ्यात पोचले असावे.हळूहळू पसरत जाऊन महाभारत काली,सुमारे तीन हजार वर्षांपूर्वी ते यमुनातीरी पोचले.गुरे-ढोरे बाळगणाऱ्या,नांगराने शेती करणाऱ्या तथाकथित आर्य जमातींच्या इतिहासात वने जाळण्याच्या कापण्याच्या अनेक घटना आढळतात.महाभारतातील राज्ये लहान होती.एक राजधानी,सभोवती शेती असलेली खेडी व त्याभोवती अरण्य असे राज्यांचे स्वरूप होते.पण ही अरण्ये म्हणजे कोणाचीच मालकी नाही अशी भूमी नव्हती.मोहासारख्या वनोपजावर,
शिकारीवर,कुदळीने खणून फिरती शेती करण्यावर जगणारे तिथल्या रहिवासी नागांचे परिवार अशी वने जाळण्याला विरोध करत होते.रान जाळणे व शेतकऱ्यांना ते वसाहतीला देणे हे राजाच्या कर्तव्यांपैकी एक होते.तेच कृष्णा -अर्जुनांनी केले.असे रान जाळून वसाहतीला द्यायचे असेल तर त्या जमिनीला कोणी मालक असता कामा नये,म्हणून त्या भूमीत वंशपरंपरा राहणाऱ्या सर्वांचा संहार केला.
कृष्ण व अर्जुन यमुनेकाठी मजेत वनविहार करावयाला गेले असताना अरण्य जाळण्याची कल्पना निघालीच का? महाभारत सांगते की अग्नी ब्राह्मणाचे रूप घेऊन आला आणि त्याने खाद्य मागितले.ब्राह्मणाला नाही कसे म्हणणार म्हणून खांडव जाळले.
जाळले ते कसे? तर दोघांनी दोन बाजूने रथ व धनुष्यबाण असे चालवले की, एकाही प्राण्याला बाहेर निघता येऊ नये,
नागराज तक्षक कुरुक्षेत्राला गेला होता म्हणून वाचला.त्याचा मुलगा मोठ्या युक्तीने स्वत:चा प्राण देऊन आईने वाचवला.
तक्षकाच्या घराण्यातील इतर सर्व मारले गेले.खांडव वन दहनात कुठल्याच तऱ्हेचे विधिनियम दिसत नाहीत.नागांचा संहार हेच एक उद्दिष्ट दिसते.अर्जुन क्षत्रिय होता.क्षत्रियाचे ब्रीद बरोबरीच्यांशी युद्ध,क्षत्रियाचे ब्रीद शरणागताचे रक्षण,क्षत्रियाचे ब्रीद कोणाचा तळतळाट न घेणे.
अर्जुन विराटपर्वात सांगतो : मी लढत असताना कधीही बीभत्स कृत्य करत नाही. मग त्याने खांडव वन का जाळले? आतील सर्व प्राणी, पक्षी,एवढेच नाही तर स्त्रिया मुलांसकट नागपरिवार निःशेष का मारले?असे दिसते की शरणागताचे रक्षण, बरोबरीच्याशी युद्ध करणे हे क्षत्रियांचे नियम स्वतःच्या समाजापुरते होते.ते परकीयांना लागू पडत नव्हते.
एकोणिसाव्या शतकात गोऱ्या लोकांनी दक्षिण अमेरिकेतील अर्जेन्टीनातील,ऑस्ट्रेलियन खंडाच्या टास्मानिया बेटावरील आदिवासींची जनावरांची करावी तशी शिकार केली,असा अगदी ताजा इतिहास आहे.त्याच शतकात त्याच गोऱ्या लोकांनी भारत पादाक्रांत केल्यावर कायद्यांच्या आधारे अरण्यभूमीत वंशपरंपरा राहणाऱ्या अनेक आदिवासीयांचे सर्व हक्क हिरावून घेतले.एका दिवसात त्यांचे पिढ्यान् पिढ्यांचे उपजीविकेचे मार्ग हे अपराध ठरवले.मग त्यांना वेठबिगारीला लावले.दूरदूरच्या चहाच्या मळ्यांत जायला लावून तेथे गुलामांसारखे वागवले.
रेमंड डास्मान या परिसरशास्त्रज्ञाने प्राधान्याने स्वतःच्या पंचक्रोशीतील निसर्गसंपत्तीवर गुजराण करणाऱ्या मानव समाजांना परिजन अथवा ecosystem people, केवळ वस्तीच्या आसमंतातील संसाधनेच उपलब्ध न राहता दूर दुरून आणलेली संसाधने वापरणाऱ्या मानव समाजांना ऊर्वीजन अथवा biosphere people असे नामाभिधान सुचवले आहे.रामचंद्र गुहा आणि मी सुचवतो की मानव - निसर्ग ह्यांच्या परस्परसंबंधांचा विचार करता एक तिसरा वर्ग संभावतो;तो म्हणजे आसमंतातील संसाधनांपासून ज्यांची जबरदस्तीने, बळजबरीने फारकत झालेली आहे असे लोक- परिविस्थापित अथवा eco logical refugees. खांडव वन जाळले तेव्हा असा परिविस्थापित झालेला
नाग त्या वेळी तक्षकाच्या घरी पाहुणा म्हणून आलेला. एक असुर,मयासुर,कृष्ण ह्यालाही मारू इच्छित होता,पण अर्जुनाने त्याला अभयदान दिले.मय हा उत्तम शिल्पशास्त्री होता.जीवदानासाठी कृतज्ञता व्यक्त करत त्याने युधिष्ठिराला मयसभा बांधून दिली. अशा वास्तूंचे मुख्य उद्दिष्ट असते आपला दिमाख मिरवणे.एका दृष्टीने हे पूर्णपणे सफल झाले,आणि मयसभेचा भपका बघून कौरवांच्या मनात जो मत्सर निर्माण झाला,त्यातून महाभारताचे युद्ध घडून आले.
जगात सर्वत्रच फैलावत असलेल्या बलिष्ठ समाजांनी ते जिथे पसरत होते,त्या मुलखात आधी राहणाऱ्या समाजांना एक तर नष्ट केले,वेगळे ठेवत अंकित केले, किंवा सामावून घेतले. कृष्ण-अर्जुनांनी नागांना समूळ नष्ट करण्याचा प्रयत्न केला.पण ह्या जोडीलाच वेगवेगळे समाज एकत्र येऊन त्यांचे मिश्रणही होऊ लागले. अर्जुनानेच नागकन्या उलूपीशी विवाह केला.भीमाने असुरांच्यातल्या हिडिंबेशी.परंतु पूर्ण वंशच्छेद अथवा सामावून जाणे ह्याहूनही जास्त प्रमाणात भारतीय समाजात ज्यांच्यावर वर्चस्व प्रस्थापित केले अशा समाजांना वेगळे ठेवून,त्यांच्याशी रक्तसंबंध टाळून खालच्या पातळीवरच्या जाती - पोटजाती घडवण्यात आल्या असे दिसते.अशा जाती-जातींत संकर होणे अनिष्ट अशी विचारधारा उद्भवली.महाभारत युद्धाच्या आरंभी अर्जुन कृष्णाला स्पष्टच म्हणतो,वर्णसंकरातून अनर्थ उद्भवतो : तैसा कुळी क्षयो होये। तेव्हळि आदि धर्म जाए। मग आन काही आहे। पापावांचौनि।। जै यमनियम ठाकवि। तें इंद्रियें सैरा विचरति। म्हणौनि व्यभिचार घडती। कुळचियं ।। उत्तम अघमी संचरति। वर्णावर्ण मिसळति। तेथ समूळ उपडति। जातिधर्म।। जैसें चौदष्टांचेया बळी। पावति मेरा काढली। महापापे कुव्छि। प्रविशति ।।
भारताबाहेरील समाजात मात्र अमे वर्णसंकट, जातिसंकट टाळले पाहिजेत अशी रचना रुजली नाही. चीनमध्ये राज्यातले प्रशासक मॅन्डारिन हा प्रतिष्ठितांचा कंपू समाजाच्या सर्व थरातून स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून निवडला जाई.मध्ययुगीन युरोपात विद्यापीठांच्या माध्यमांतून समाजाच्या वेगवेगळ्या थरांतून लोक विद्वत्तेच्या बळावर एकत्र येऊ लागले. आधुनिक गणितीय तर्कशास्त्राचा जनक समजला जाणारा जॉर्ज बूल केम्ब्रिजला गणिताचा प्राध्यापक होता. पण त्याचा बाप चांभार होता आणि आई घरगुती मोलकरीण.युरोपीय समाजात जातिव्यवस्था नाही,तर समान आर्थिक हितसंबंध जपणाऱ्या "व्यापाऱ्यांचे गिल्ड" अतिशय प्रभावी बनले.
बुद्ध
महाभारतातली यमुनाकाठच्या खांडववन दहनाची घटना बहुधा तीन हजार वर्षांपूर्वी घडली.वनाच्छादित भारतात पशुपालक आर्यांचा विस्तार होत असताना यज्ञसंस्कृतीला मोठे महत्त्व प्राप्त झाले.नव्या मुलखात वस्ती करताना वनप्रदेशात आश्रम स्थापन करून मोठ्या प्रमाणात लाकूड जाळत तिथे गुरांना अनुकूल अशी माळराने निर्माण करायची.ह्याला विरोध करणाऱ्यांना राक्षस-असुर अशा संज्ञा देऊन त्यांच्यावर पशुपालकांतील योद्ध्या क्षत्रियांनी आक्रमण करून हटवायचे अशी प्रणाली प्रस्थापित झाली.गंगेच्या खोऱ्यात जसजसे मूळचे सालाचे अरण्य तोडले गेले आणि रानात शिकार कंदमुळे आणि फिरती शेती करणाऱ्या नाग असुरांसारख्या समाजाच्या जागी स्थायी शेती व जोडीला पशुपालन करणाऱ्यात समाजाची वसाहत वाढत गेली,तसतसे यज्ञाचे जे मूळचे जंगल नष्ट करत जमीन स्थिर शेती-पशुपालनाखाली आणण्याचे कार्य होते ते संपुष्टात आले.तदनंतरच्या पाच शतकात बहुधा संपूर्ण गंगा खोऱ्यात जिथे सहज शक्य होते,तिथे कृषि पशुपालन संस्कृतीचा विस्तार पुरा झाला.या कारणे बुद्धाच्या काळात,दोन हजार पाचशे वर्षांपूर्वी, यज्ञाचे मूळ समर्थन गैरलागू झाले.
ह्या सर्व काळात,नव-नवा प्रदेश पादाक्रान्त करणारी आक्रमक संस्कृती वरचढ होती.एक वर्णव्यवस्था रूढ होत गेली.
ब्राह्मणांची,क्षत्रियांची,वैश्यांची,शूद्रांची कर्तव्ये त्यांनी परंपरेप्रमाणे बजावणे हेच सर्वश्रेष्ठ मूल्य;दुसरी काहीही मूल्ये मानू नयेत,असे प्रतिपादन केले गेले.ह्या व्यवस्थेत खालच्या आणि वरच्या वर्णाच्या लोकांच्यातील देवाण-घेवाण ही उघडपणे खालच्या वर्गांच्या दृष्टीने अन्याय्य होती.
ज्ञानेश्वरीतल्या अठराव्या अध्यायात म्हटलेच आहे ना :
तेचि चारी वर्ण । पुससी जरी कोण कोण ।
तरी जयां मुख्य ब्राह्मण । धुरेचे कां ।। ८१८ ।।
येर क्षत्रिय वैश्य दोन्ही । तेही ब्राह्मणाच्याचि मानिजे मानी । जे ते वैदिकविधानीं । योग्य म्हणौनि ।। ८१९ ।। चौथा शूद्रु जो धनंजया । वेदीं लागु नाहीं तया । तह वृत्ति वर्णत्रया । आधीन तयाची ।। ८२० ।। तिये वृत्तिचिया जवळिका । वर्णा ब्राह्मणादिकां । शूद्रही कीं देखा। चौथा जाला ।।
साहजिकच यज्ञसंस्कृतीबाबत असंतोष व विरोध पसरत होता.यज्ञात मोठ्या प्रमाणात पशू - शेतकऱ्यांची गोसंपदाही बळी दिली जायची.त्याबाबत शेती-पशुपालन करणाऱ्यांवर जो बोजा पडत होता त्याबद्दल चीड उत्पन्न होत होती.क्षत्रियांनी सतत कर्तव्य म्हणून लढलेच पाहिजे,हिंसा केलीच पाहिजे,हे नाकारण्याचा विचार निर्माण होऊ लागला होता. करुणा,मैत्री अशीही मूल्ये महत्त्वाची असू शकतील असे मनात येऊ लागले होते.अशा काळात शाक्य गौतमाचा जन्म झाला.नदीच्या पाण्यावरून शाक्यांचा शेजारच्या टोळीशी सतत संघर्ष चालू होता.अशा संघर्षात लढणे, हिंसा करणे हे गृहस्थाश्रमी गौतमाचे कर्तव्य होते.पण ही समाजरचना बदलली पाहिजे,वेगळ्या मूल्यांचा विचार केला पाहिजे,असे मनात आणून त्याने गृहस्थाश्रमाचा त्याग केला.देहदंड करणारे तप केल्यावर ह्यातून काही चांगले निष्यत्र होत नाही,असे त्याच्या मनात आले आणि मग त्याला चार आर्यसत्ये समजली.अशी अगदी वेगळी मुल्ये,मग तो प्रतिपादन करत राहिला.समाजशील मानवाच्या मनात जी स्वार्थपरायणता आणि समूहासाठी काहीतरी त्याग करतही वेगळे करायला पाहिजे अशी जी भावना असते,त्या प्रवृत्तीचे समर्थन करत त्याने धर्मरचना केली.
बुद्ध सांगतो की जगात दुःख आहे हे कोणालाही नाकबूल करता येत नाही.परंतु जो तो आपले दुःख कसे नष्ट होईल याच विचारात असतो.त्याचा परिणाम असा होतो की,दुसऱ्याचा घातपात करून देखील प्रत्येक जण आपण सुखी होऊ इच्छितो.त्यांत जे हिंसक असून बुद्धिमान असतात,ते पुढारी बनतात,व इतरांना त्यांचे ताबेदार व्हावे लागते.हिंसक बुद्धीमुळे या पुढाऱ्यात देखील एकोपा राहत नाही आणि त्यांना सगळ्यांत जास्त हिंसक आणि बुद्धिमान पुढाऱ्याला आपला राजा करून त्याच्या तंत्राने वागणे भाग पडते.राजाला आपले राज्य दुसरा राजा घेईल असे भय वाटते,
आणि त्याच्या सुरक्षितपणासाठी तो यज्ञयाग करून अनेक प्राण्यांचे बळी देतो.अशा प्रकारची मनुष्यांना आणि इतर प्राण्यांना उपद्रवकारक समाजरचना नष्ट करून तिच्या जागी दुसरी हितसुखकर संघटना उभारावयाची असेल, तर प्रत्येकाला आपले आणि इतरांचे दुःख एक आहे अशी जाणीव झाली पाहिजे;आणि म्हणूनच बुद्ध भगवंताने पहिल्या आर्यसत्यांत सर्वसाधारण दुःखाचा समावेश केला.सामाजिक पशुंच्यात इतरांवर कुरघोडी करण्यासाठी सतत चढाओढ चालते.ह्या चढाओढीत सरशी होण्यासाठी प्राणी दिमाख दाखवण्याच्या मागे लागतात,व असा तोरा मिरवण्यासाठी उधळपट्टी करत राहतात.ही उधळपट्टी करण्याची ओढ,म्हणजेच मानवाची अनेक तऱ्हेची हाव अथवा तृष्णा. मनुष्याची तृष्णा हेच दुःखाचे खरे कारण आहे,हे बुद्ध भगवन्ताचे महत्त्वाचे प्रतिपादन होते.हे होते पहिले आर्यसत्य.ही तृष्णा जोपर्यंत असेल तोपर्यंत दुःख उत्पन्न होणारच,हे दुसरे आर्यसत्य.तृष्णेचा नाश करण्यानेच मनुष्य दुःखांतून मुक्त होतो,हे तिसरे आर्यसत्य. तृष्णानाशाचा उपाय म्हटला म्हणजे दोन अंतांच्या, देहदंड व भोगवाद ह्यांच्यामधून जाणारा आर्य अष्टांगिक मध्यम मार्ग,हे चौथे आर्यसत्य.
पण बुद्धाने स्पष्ट केले की तो जे काय सांगतो ती अधिकारवाणी मानू नये.ते विचारान्ती तुम्हाला पटले तरच मान्य करा.वास्तव नीट जाणायचे असेल तर कोणतीही अधिकारवाणी न मानता सर्व विधाने वास्तवाच्या निकषावर पडताळून पाहणे हा एकच परिणामकारक मार्ग उपलब्ध आहे.