मूळ लेखक / स्रोत / संदर्भ
संदर्भग्रंथ : Amartya Sen — The Country of First Boys and Other Essays
प्रकाशक : Oxford University Press
लेख/संदर्भ : ग्रंथांचिया द्वारी — अतुल देऊळगावकर
प्रकाशक : विश्वकर्मा पब्लिकेशन, पुणे
अनुवादक : उल्लेख नाही
विकासाचा खरा अर्थ
गेली तीन दशके जगातील निवडक विचारवंतांमध्ये डॉ. अमर्त्य सेन यांचे नाव अग्रभागी आहे. जागतिक समस्यांवरील त्यांचे भाष्य ऐकण्यासाठी अवघे जग सदैव सज्ज असते. अर्थशास्त्रातील कूट समस्या असो वा मंदीतून बाहेर पडण्याचे उपाय, सेन यांचे मत अनिवार्य असते. जोसेफ स्टिगलिट्झ, पॉल क्रुगमन, अॅग्नेस डीटन, थॉमस पिकेटी, अँथनी अॅटकिन्सन हे जगातील आघाडीचे अर्थवेत्ते, ‘आर्थिक विषमता, गरिबी, जागतिकीकरणाचे लाभ’ हे आज कळीचे ठरलेले मुद्दे जागतिक विषयपत्रिकेवर आणण्याचे श्रेय अर्थतत्त्वज्ञ डॉ. अमर्त्य सेन यांनाच देतात.
आज विकासाच्या भाषेचा बोलबाला आहे. The Country of First Boys या पुस्तकातून सेन यांनी भूक, शिक्षण, आरोग्य, प्रसारमाध्यमे, जागतिकीकरण, परस्परावलंबी जग अशा अनेक अंगांनी विकास तपासून पाहिला आहे.
श्रीमंत राष्ट्रांमधील सर्व नागरिक सुखी आहेत का? जगातील प्रबळ लष्करी राष्ट्र शांत व सुरक्षित आहेत का?
समाजातील अशांततेच्या आणि असुरक्षिततेच्या कारणांचा नायनाट केला नाही, तर शांतता कशी प्रस्थापित होईल? मग अर्थशास्त्राचा अर्थ तरी काय? सेन यांनी ‘दारिद्र्य, युद्ध आणि शांतता’ या निबंधातून हिंसेचा अन्वय लावला आहे.
विकास ही संकल्पना केवळ आर्थिक नसून, त्यामध्ये संपूर्ण समाजाचा विकास अभिप्रेत आहे.
निर्जीव वस्तूंच्या उत्पादनाचे मोजमाप हे विकासाचे निर्देशक होऊ शकत नाही. त्यावरून सामान्य माणसाच्या परिस्थितीचा यत्किंचितही अदमास लागत नाही. जर मानवी समूहाच्या जीवनात गुणात्मक बदल झाला, तरच तो विकास अर्थपूर्ण असेल, या विषयावर अनेक वर्षांपासून सुरू असणाऱ्या वाद-संवादाला नव्वदच्या दशकात टोक आले.
त्या दशकात ब्रिटनच्या पंतप्रधान मार्गरेट थॅचर व अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रोनाल्ड रेगन यांनी मोकाट अर्थकारणाचा जाहीरनामा घोषित केला होता. ‘सरकारने कल्याणकारी कार्य थांबवावे. पाणी, शिक्षण, आरोग्य यांची हमी घेऊ नये. बाजारपेठेमधील हस्तक्षेप थांबवावा. ते काम खाजगी संस्थांवर सोपवावे.’ थॅचर-रेगन आणि मंडळींनी संयुक्त राष्ट्रसंघाची गरिबाभिमुख धोरणे बदलण्यास भाग पाडले.
‘१९८०चे दशक हे रोजगारहित विकासाचे दशक होते.’
अशीच स्थिती सुरू ठेवल्यास जगाची वाटचाल विध्वंसाच्या खाईकडे असेल, असा या मोकाट अर्थकारणावर घणाघाती हल्ला पाकिस्तानमधील अर्थवेत्ते डॉ. मेहबूब उल हक यांनी चढवला. त्यांनी अमर्त्य सेन, सुधीर आनंद, कीथ ग्रिफिन, फ्रान्सिस स्ट्युअर्ट यांच्या सहकार्याने विकासाची मीमांसा करणारा अभ्यासगट स्थापन केला.
डॉ. हक यांनी ‘शिक्षण, आरोग्य, पिण्याचे पाणी, जळण, पर्यावरण, यांचा विचार करून माणसांची अवस्था ठरवली पाहिजे,’ हा सिद्धांत १९९०मध्ये मांडला आणि जगाच्या अर्थविचारांना कलाटणी दिली. पुढे त्यांनी संयुक्त राष्ट्रसंघाकरिता मनुष्यविकास निर्देशांक तयार केला. प्रो. अमर्त्य सेन यांनी त्यांचे घनिष्ठ मित्र डॉ. हक यांच्या विचारांना तात्त्विक अधिष्ठान मिळवून दिले.
तेव्हापासून अवघे जग मनुष्यविकास निर्देशांकांच्या घोषणेची दरवर्षी वाट पाहत असते. ‘प्रत्येक देशाचे प्रगती पुस्तक’ अशी ख्याती मनुष्यविकास निर्देशांकाला प्राप्त झाली आहे.
(या दोन अर्थतत्त्वज्ञांना जन्माला घालणारे भारत व पाकिस्तान हे सख्खे शेजारी, लष्करी सामर्थ्यामध्ये जगात आघाडीवर आणि मनुष्यविकासाच्या यादीमध्ये जगाच्या तळाशी आहेत.)
भाग समाप्त — विकासाचा खरा अर्थ माणसाच्या जीवनमानात आहे
शिक्षणातून विकासाची वाट
१. राष्ट्राची प्रगती केवळ आर्थिक निकषांवर नाही, तर मानवी जीवनात झालेल्या सुधारणांवरही मोजली गेली पाहिजे, या विचारातून डॉ. हक यांनी ‘मनुष्य विकास निर्देशांक’ विकसित केला व तो १९९० पासून संयुक्त राष्ट्रसंघाच्या विकास कार्यक्रमाचा भाग बनला.
पहिला नंबर! सर्व जातिधर्मातील आबालवृद्धांना या पहिल्या नंबरची विलक्षण भुरळ आहे. त्यामुळे पहिल्या नंबरला भारतभूमीवर सदासर्वदा कमालीचा आदर आहे. हा ‘नंबरी भाव’ सर्वांच्या अंगवळणी पडला आहे. त्यामुळे अनेक भेदभाव जपले गेले आहेत. डॉक्टर, इंजिनियर, सी.ए., आय.टी. पदवीधर यांना घर व शाळेपासूनच विशेषत्व बहाल केले जाते.
The Country of First Boys या पुस्तकात अर्थतत्त्वज्ञ प्रा. अमर्त्यकुमार सेन म्हणतात, ‘समस्त भारतीयांना प्रदीर्घ काळापासून ‘पहिला क्रमांक’ या लक्षण समूहाने (सिंड्रोम) पछाडलेले आहे.’ ५० वर्षांपूर्वी विंदा करंदीकर यांनी याच भावनेतून ‘एटू लोकांचा देश’ ही कविता लिहिली होती.
राष्ट्रीय पातळीवर अतिशय उच्च पदे उपभोगलेल्या व्यक्तींना शाळेतील नंबरचा आणि गुणांचा विसर कधीही पडू शकत नाही. प्रगत देशांत असे फाजील लाड होत नाहीत.
भारताच्या संदर्भात सेन म्हणतात, ‘वैयक्तिक पातळीवर न थांबता या ‘लाडांनी’ संपूर्ण शिक्षण व्यवस्था बिघडवून टाकली आहे. केवळ अभिजनांच्या शिक्षणांची काळजी वाहणारी व्यवस्था प्राथमिक शिक्षणाची पुरेपूर उपेक्षा करते. आपल्या देशातील अकार्यक्षम व अतिशय सुमार प्राथमिक शिक्षणयंत्रणेमुळे कोट्यवधी मुले शिक्षणापासून दुरावतात. कुशल मनुष्यबळ निर्माण करण्यातील हा मोठा अडसर आहे. मनुष्यबळाची अशी परवड करणारी अर्थव्यवस्था भक्कम होऊ शकत नाही.’
जपानमध्ये १८७२ साली ‘शिक्षणाविना कुठल्याही समूहातील एकही कुटुंब वा कुटुंबातील सदस्य अशिक्षित राहणार नाही,’ असा शिक्षणविषयक महत्त्वाकांक्षी जाहीरनामा प्रसृत केला गेला. त्यातून शिक्षणामधील त्रुटींकडे बारकाईने लक्ष दिले गेले. परिणामी, १९१० साली जपान संपूर्णपणे साक्षर होऊन आर्थिक झेप घेण्यासाठी सक्षम झाला.
या जपानच्या अनुभवापासून दक्षिण कोरिया, चीन, तैवान, हाँगकाँग, सिंगापूर, थायलंड या देशांनी स्फूर्ती घेऊन तोच कित्ता गिरवला. आर्थिक जागतिकीकरणाच्या काळात पूर्व आशियायी देशांचा चमत्कार जगासमोर आला, विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात शिक्षणात केलेल्या गुंतवणुकीची ती परिणती होती. त्यामुळे या देशांत नवीन रोजगाराच्या संधी सहज उपलब्ध झाल्या. निर्यात वाढली. आरोग्याच्या समस्या कमी झाल्या.
व्यक्ती, समाज व राष्ट्राच्या जीवनात विद्येमुळे कसा ‘अर्थ’ प्राप्त होतो, हे सेन उलगडून दाखवतात.
वैयक्तिक व सामाजिक जीवनामध्ये आमूलाग्र परिवर्तन घडविण्याची किमया शिक्षणच करू शकते.
शिक्षण हा अग्रक्रम नसणारे देश विकास घडवू शकत नाहीत; परंतु मोकाट अर्थव्यवस्थेचे पाठीराखे तथाकथित ‘इंटरनॅशनल स्कूल’चा सुळसुळाट पाहून थरारतात. त्यांना शिक्षणदेखील पूर्णपणे बाजारपेठेच्याच हातात सोपवायचे आहे. शिक्षणप्रसार हा दारिद्र्य निर्मूलनातील कळीचा व अटळ भाग आहे, याची जाण असणाऱ्या अॅडम स्मिथलासुद्धा अशी भांडवलशाही अभिप्रेत नव्हती.
भारतात प्राथमिक शिक्षण सार्वत्रिक करण्यातील मोठा अडसर, पायाभूत रचना हाच आहे. अजूनही शिक्षणाच्या महामार्गावर कित्येक जाती-जमातींमधील पहिली पिढी येऊ शकत नाही. भटके व आदिवासींना शिक्षणात सामावून घेण्यासाठी उदार व लवचीक धोरण आवश्यक आहे; परंतु ती प्राथमिकता नसल्यामुळे शिक्षणातील दरी वाढतच आहे.
याची खंत बाळगणाऱ्या प्रा. सेन यांनी प्राथमिक शिक्षण, प्राथमिक आरोग्यसेवा आणि लिंगसमानता रुजविण्यासाठी नोबेल पुरस्काराची पूर्ण रक्कम घालून १९९८मध्ये ‘प्रतिची’ या संस्थेची स्थापना केली. (१९१३ साली रवींद्रनाथ टागोर यांनी नोबेल पुरस्काराची रक्कम ‘शांतीनिकेतन’ स्थापण्यासाठी दिली होती.)
बिहार, झारखंड, ओरिसा, पश्चिम बंगाल या राज्यांत, ‘अतिशय हलाखीतील पालक कमालीच्या हालअपेष्टा सहन करत मुलांना शिकवण्यासाठी जीवाचा आटापिटा करीत असतात. प्राथमिक शाळेत दाखल करण्यासाठी भरमसाठ देणग्या मागितल्यामुळे शाळेपासून वंचित राहणाऱ्यांची संख्या वाढत आहे,’ असे या संस्थेचे सर्वेक्षण सांगते.
शिक्षक आणि आरोग्य सेवकांना अर्पण केलेल्या या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर, दिल्लीतील वाहतुकीच्या रस्त्याच्या कडेला अंगाचे मुटकुळे करून हाताच्या आधारावर डोके टेकवत गृहपाठ करणाऱ्या चिमुकलीचे छायाचित्र आहे.
पाचव्या शतकात साहित्य, भाषाशास्त्र, वास्तुकला, शिल्पकला, खगोलशास्त्र, औषधी विज्ञान, सार्वजनिक आरोग्य ह्या विषयांमधील जगभरातील अभ्यासकांना उच्च शिक्षण मिळवण्याकरिता नालंदा हे एकमेव विद्यापीठ उपलब्ध होते. चीन, जपान व इतर आशियाई देशांमधील विद्यार्थी तेथे अध्ययनासाठी येत असत.
११९०पासून झालेल्या हल्ल्यांमुळे, सुमारे ७०० वर्षे चाललेली अध्ययन व अध्यापन यात्रा खंडित झाली. (ऑक्सफर्डची स्थापना ११६७, केंब्रिज स्थापना — १२०९) अशा या ऐतिहासिक नालंदा विद्यापीठाचे पुनरुज्जीवन करण्याची कल्पना सेन अनेक वर्षांपासून मांडत होते.
२००७मध्ये आशियाई राष्ट्रांच्या परिषदेमध्ये फिलिपाइन्स, चीन, जपान, कोरिया, सिंगापूर या देशांनी नालंदा विद्यापीठाच्या पुनर्स्थापनेचा ठराव मंजूर केला. पुढे जागतिक पातळीवरील तज्ज्ञांची निवड करून कार्यकारी समिती तयार केली आणि त्याचे नेतृत्व प्रा. सेन यांच्याकडे चालून आले.
तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, तसेच बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार (आणि उपमुख्यमंत्री सुशील मोदीसुद्धा) यांनी सदैव व सर्व प्रकारचे पाठबळ दिले. सिंगापूरचे परराष्ट्रमंत्री जॉर्ज यो हे उत्साहाने सहभागी झाले.
केवळ व्यापारच नाही, तर ज्ञानसाधनासुद्धा विविध देशांना एकत्र आणू शकते, हे दाखवून देण्यासाठी अनेक नवनवीन कल्पना घेऊन आंतरराष्ट्रीय स्तरावरील शिक्षणसंस्था निर्माण करण्याचे अथक प्रयत्न चालू होते. मोदी सरकार आल्यानंतर अनेक हस्तक्षेपांमुळे त्याला कशी खीळ बसली, याची सविस्तर कैफियत सेन यांनी मांडली आहे.
सर्व सीमांच्या पलीकडे जाऊन विचार करणारी प्रा. सेन, डॉ. अनिल काकोडकर व रघुराम राजन, ही प्रभावळ राष्ट्राचे भूषण असते. त्यांना नाकारून त्यांचे वैयक्तिक नुकसान काहीच होत नाही. राष्ट्राची मात्र अपरिमित हानी होते.
‘रागमाला’ या आत्मचरित्रात रविशंकर यांनी ‘टागोर यांचा जन्म पाश्चिमात्य देशात झाला असता, तर त्यांना शेक्सपियर व गटे यांच्या मालिकेत स्थान लाभले असते,’ असे म्हटले आहे.
सेन म्हणतात, ‘हा दावा अतिशयोक्त असला, तरी त्यातून टागोरांच्या विचारांची महती आजही टिकून असल्याकडे रविशंकर लक्ष वेधू इच्छितात. केवळ भारत व बांगला देशच नाही, तर जपान व चीनमध्ये सुद्धा आजदेखील टागोर यांच्या लघुकथा, कविता, निबंध व पत्रव्यवहारांना वाचकवर्ग लाभत आहे.’
खुल्या मनाने प्रत्येक बाबीची कसून चिकित्सा करण्याचे स्वातंत्र्य हे रवींद्रनाथांचे विलक्षण वैशिष्ट्य होते. याबाबत ते काळाच्या खूपच पुढे होते.
१९३४मध्ये ‘बिहारचा भूकंप म्हणजे जातिभेद पाळण्याची परमेश्वराने दिलेली शिक्षा आहे,’ असे गांधीजी म्हणाले होते. याला जाहीर उत्तर देताना ‘जातिप्रथा ही वाईटच आहे; परंतु भूकंप हा नैसर्गिक आहे, दोन्हींचा एकमेकांशी अजिबात संबंध नाही,’ असे रवींद्रनाथांनी स्पष्टपणे सांगितले होते.
गांधीजींविषयी असलेल्या अतीव आदरामुळे त्यांना ‘महात्मा’ या उपाधीने गौरवणाऱ्या रवींद्रनाथांनी त्यांच्याशी असणारे मतभेद वेळोवेळी निःसंकोचपणे व्यक्त केले. व्यक्ती वा सत्ता यांच्यामुळे दबून न जाता सुसंस्कृतपणे मतभिन्नता जपण्याच्या स्वातंत्र्याला रवींद्रनाथांनी मूलभूत हक्क मानले.
सेन यांनी ‘टागोर यांनी कोणता बदल घडवला?’ या निबंधात रवींद्रनाथांच्या विचारांमधील अभिजाततेची महती उलगडून दाखविली आहे. पौर्वात्य व पाश्चात्त्य विचार, नवता व परंपरा, निसर्ग व मानव, व्यक्ती व समाज, बुद्धी व भावना ही सारी द्वैते मिटवून त्यांच्यात अद्वैत साधत भारताला त्यांनी आधुनिक व उदार विचार दिला.
‘क्षुद्र भिंतीविना अखंड जग, मुक्त ज्ञान आणि भयशून्य मन’ ही रवींद्रनाथांची आकांक्षा पसायदानासारखी त्रिकालाबाधित राहणार आहे.
‘कोणाच्या आधारे करू मी विचार, कोण देईल धीर माझ्या जीवा, शास्त्रज्ञ, पंडित नाही मी एक वाचक, याती शुद्ध एक ठाव नाही.’
संत तुकाराम यांनी सांगितलेली अशी अवस्था, आपल्यासाठी अनेक वेळा होते. आपल्या सर्वांच्या आयुष्यातील घटना व प्रसंग साधारणपणे सारखेच असतात. सर्वसाधारण व्यक्ती घटनांच्या खोलात जात नाहीत. एखाद्या घटनेमुळे अस्वस्थ झाल्यास वैयक्तिक निष्कर्ष काढत व्यक्तीला अथवा नशिबाला जबाबदार धरून हा प्रवास थबकतो.
असामान्य व्यक्ती खोलवर बुडी मारून त्या प्रसंगामागील कारणांचा शोध घेतात. त्यांच्यामुळे महाकाय व्यवस्थेचे आकलन होते. जटिलता, गुंतागुंत, अव्यवस्था ध्यानात येते. प्रश्नाचे स्वरूप आणि उत्तरांची दिशा समजते.
समाजाला विचारांचा आणि विवेकाचा आधार देऊ शकणारे विचारवंत अतिशय दुर्मीळ असतात. वाणी आणि लेखणी यांतून वर्तमानाचा अन्वय घेऊन भविष्यासाठी कृतिआराखडा देणारे प्रा. सेन यांच्यासारखे तत्त्वज्ञ दुर्लभ असतात.
महान कलावंत प्रदीर्घ कालखंडभर एखाद्या संकल्पनेचा विस्तार करीत जातात, निरनिराळ्या पद्धतींनी ती समजावून सांगतात. यातून रागमालिका, चित्रमालिका व वास्तुसंकुलं निर्माण होतात.
गेल्या ४४ वर्षांपासून प्रा. सेन, दारिद्र्यामागील अनेक कारणांचा सखोल मागोवा घेत नवीन पद्धतीने विश्लेषण करीत आहेत. एकाच वेळी तज्ज्ञ व सामान्यांशी संवाद साधताना तशीच मालिका सादर करीत आहेत.
विलंबित, द्रुत, टप्पा, तराणा, या सर्व रीतींनी एकच राग ऐकण्याचा अवर्णनीय आनंद शब्दातीत आहे. त्या दर्जाचा आनंद प्राप्त करायचा असेल, तर सुज्ञांनी हे पुस्तक वाचलेच पाहिजे.
भाग समाप्त — विद्येमुळे व्यक्ती, समाज आणि राष्ट्राच्या जीवनाला प्राप्त होणारा ‘अर्थ’
संपादकीय तथ्यपडताळणी
१. अमर्त्य सेन यांचे अर्थशास्त्रातील योगदान
स्थिती : निश्चित
अमर्त्य सेन यांना १९९८चा अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार कल्याण अर्थशास्त्रातील योगदानासाठी देण्यात आला. त्यांच्या संशोधनात दारिद्र्य, विषमता, सामाजिक निवड आणि दुष्काळ यांचा विशेष अभ्यास होता. कल्याण मोजताना केवळ उत्पन्न न पाहता व्यक्तीच्या प्रत्यक्ष संधी व क्षमतांचा विचार करावा, हा त्यांच्या विचारांचा महत्त्वाचा भाग आहे.
२. मनुष्यविकास निर्देशांक आणि महबूब उल हक
स्थिती : निश्चित
१९९०च्या पहिल्या Human Development Report मध्ये विकासाकडे केवळ राष्ट्रीय उत्पन्नाच्या दृष्टीने न पाहता मानवी जीवनातील संधी, आरोग्य, शिक्षण आणि योग्य जीवनमान यांचा विचार करण्याची भूमिका मांडण्यात आली. महबूब उल हक यांच्या नेतृत्वाखाली हा दृष्टिकोन UNDPच्या विकासविचारात केंद्रस्थानी आला. अमर्त्य सेन यांच्या capability approach चा त्यावर महत्त्वाचा बौद्धिक प्रभाव होता.
म्हणून लेखातील “हक यांनी निर्देशांक विकसित केला आणि सेन यांनी त्याला तात्त्विक अधिष्ठान दिले” हा मुख्य आशय मोठ्या प्रमाणात बरोबर आहे.
३. थॅचर–रेगन आणि ‘मोकाट अर्थकारण’
स्थिती : अंशतः बरोबर / लेखकाचे विश्लेषण
मार्गरेट थॅचर आणि रोनाल्ड रेगन यांच्या काळात बाजाराभिमुख आर्थिक धोरणांना मोठे महत्त्व मिळाले, हे ऐतिहासिकदृष्ट्या मान्य आहे. मात्र “त्यांनी संयुक्त राष्ट्रसंघाची गरिबाभिमुख धोरणे बदलण्यास भाग पाडले” हा शब्दशः कारण-परिणामाचा दावा अधिक गुंतागुंतीचा आहे. त्यामुळे तो लेखकाचा राजकीय-आर्थिक विश्लेषणात्मक निष्कर्ष म्हणून वाचणे योग्य आहे.
४. १९८०चे दशक आणि रोजगार
स्थिती : संदर्भाधारित / पुरावा अपुरा
‘१९८०चे दशक हे रोजगारहित विकासाचे दशक होते’ हे एक व्यापक मूल्यांकन आहे. याला सार्वत्रिक, निर्विवाद ऐतिहासिक तथ्य म्हणून मांडण्यासाठी देशनिहाय रोजगाराच्या आकडेवारीची आवश्यकता आहे. त्यामुळे हे वाक्य लेखकाच्या संदर्भातील आर्थिक मूल्यांकन म्हणून ठेवणे योग्य.
५. जपानची १८७२ची शिक्षणव्यवस्था
स्थिती : अंशतः बरोबर
जपानने १८७२मध्ये आधुनिक राष्ट्रीय शिक्षणव्यवस्थेची पायाभरणी करणारा Gakusei अर्थात Education System Order जारी केला. त्यातून देशभर शाळांची रचना उभारण्याचा प्रयत्न झाला. १८८६मध्ये प्राथमिक शिक्षणव्यवस्था अधिक व्यवस्थित करण्यात आली आणि सक्तीच्या शिक्षणाचा विस्तार झाला.
मात्र “१९१० साली जपान संपूर्णपणे साक्षर झाला” हा अचूक दावा स्वतंत्र स्रोतांमधून येथे निश्चित करता आला नाही. त्यामुळे तो पुरावा अपुरा म्हणून नोंदवणे योग्य.
६. प्रतिची संस्था आणि नोबेल पुरस्काराची रक्कम
स्थिती : अंशतः बरोबर
अमर्त्य सेन यांनी १९९८च्या नोबेल पुरस्कारानंतर मिळालेल्या पुरस्काराच्या रकमेतील काही भाग वापरून Pratichi Trustशी संबंधित काम सुरू केले. त्यांच्या स्वतःच्या नोबेल चरित्रात साक्षरता, प्राथमिक आरोग्यसेवा आणि लिंगसमानतेसाठी पुरस्काराच्या रकमेचा उपयोग केल्याचे स्पष्ट आहे.
मात्र प्रतिचीच्या अधिकृत संकेतस्थळानुसार Pratichi (India) Trust ची स्थापना १९९९मध्ये झाली, त्यामुळे लेखातील “१९९८मध्ये संस्थेची स्थापना” या तारखेला दुरुस्तीची आवश्यकता आहे.
७. नालंदा विद्यापीठ
स्थिती : मुख्य आशय निश्चित; काही तपशील वादग्रस्त/अतिशयोक्त
नालंदा हे प्राचीन भारतातील अत्यंत महत्त्वाचे बौद्ध शिक्षणकेंद्र होते. UNESCOनुसार नालंदा महाविहाराचा शैक्षणिक इतिहास साधारण पाचव्या ते तेराव्या शतकापर्यंतच्या दीर्घ कालखंडाशी संबंधित आहे आणि चीन, कोरिया, जपान, तिबेट, मंगोलिया, श्रीलंका व आग्नेय आशियातून विद्वान तेथे येत होते.
आधुनिक नालंदा विद्यापीठाच्या अधिकृत इतिहासानुसार पुनरुज्जीवनाची कल्पना डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी २००६मध्ये मांडली; २००७च्या East Asia Summit प्रक्रियेत त्याला पाठबळ मिळाले. भारताच्या सरकारने २००७मध्ये Amartya Sen यांच्या अध्यक्षतेखाली Nalanda Mentor Group स्थापन केला.
त्यामुळे लेखातील सेन यांच्या भूमिकेचा मुख्य भाग निश्चित आहे.
मात्र “नालंदा हे एकमेव विद्यापीठ होते”, “११९०पासून हल्ले सुरू झाले” आणि “सुमारे ७०० वर्षांची यात्रा एका विशिष्ट घटनेमुळे खंडित झाली” हे तपशील अधिक सावधपणे मांडणे आवश्यक आहे. UNESCOचा अधिकृत इतिहास नालंदेच्या ऱ्हासाला तेराव्या शतकातील विध्वंस व त्यानंतरच्या त्यागाशी जोडतो.
८. आधुनिक नालंदा विद्यापीठ
स्थिती : निश्चित
भारतीय संसदेने Nalanda University Act, 2010 मंजूर केला आणि आधुनिक नालंदा विद्यापीठाची स्थापना संस्थात्मक स्वरूपात झाली. अधिकृत माहितीनुसार पहिले विद्यार्थी सप्टेंबर २०१४मध्ये दाखल झाले.
९. अमर्त्य सेन आणि ‘The Country of First Boys’
स्थिती : निश्चित
The Country of First Boys and Other Essays हे अमर्त्य सेन यांचे पुस्तक Oxford University Pressने २०१५मध्ये प्रकाशित केले. पुस्तकात दारिद्र्य, विषमता, भूक, निरक्षरता, जागतिकीकरण, माध्यमे, स्वातंत्र्य, अन्याय आणि सामाजिक वगळणे यांसारख्या विषयांवरील निबंधांचा समावेश आहे.
संदर्भ व स्रोत
ऑनलाइन मूळ स्रोत:
१. Amartya Sen — Nobel Prize, 1998 — अधिकृत माहिती
Nobel Prize — Amartya Sen, 1998
२. UNDP — Human Development Report 1990
UNDP — Human Development Report 1990
३. UNDP — Human Development: Mahbub ul Haq आणि मानवी विकास दृष्टिकोन
UNDP — Human Development Reports
४. Pratichi — संस्थेची अधिकृत माहिती
Pratichi — About Us
५. Nalanda University — History and Revival
Nalanda University — History and Revival
६. UNESCO — Archaeological Site of Nalanda Mahavihara
UNESCO — Nalanda Mahavihara
७. Amartya Sen — The Country of First Boys and Other Essays
Oxford University Press — The Country of First Boys
८. Japan National Archives — 1872 Education System
Japan National Archives — Gakusei, 1872
ऐतिहासिक संदर्भभूमी
अमर्त्य सेन यांच्या विकासविचाराचा केंद्रबिंदू “माणसाचे जीवन किती समृद्ध झाले?” हा प्रश्न आहे. केवळ राष्ट्रीय उत्पन्न, उत्पादन किंवा संपत्ती वाढली म्हणून विकास झाला असे मानता येत नाही. आरोग्य, शिक्षण, सामाजिक संधी, स्वातंत्र्य आणि व्यक्तीला आपल्या इच्छेनुसार जीवन जगण्याची वास्तविक क्षमता यांनाही विकासाच्या मोजमापात स्थान मिळाले पाहिजे. UNDPच्या १९९०च्या पहिल्या मानव विकास अहवालातही विकास म्हणजे लोकांच्या निवडी व संधींचा विस्तार अशी भूमिका स्पष्ट करण्यात आली.
याच व्यापक विचारपरंपरेत महबूब उल हक आणि अमर्त्य सेन यांचे कार्य महत्त्वाचे ठरते. सेन यांना १९९८मध्ये कल्याण अर्थशास्त्रातील योगदानासाठी नोबेल पुरस्कार मिळाला.
शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक समानता या विषयांकडे सेन यांनी केवळ कल्याणकारी खर्च म्हणून नव्हे, तर मानवी क्षमतांच्या निर्मितीचा भाग म्हणून पाहिले. त्यांच्या नोबेल पुरस्कारानंतरच्या कार्यातही साक्षरता, प्राथमिक आरोग्यसेवा आणि लिंगसमानता यांना महत्त्व दिले गेले.
काय निश्चित? काय वादग्रस्त?
निश्चित
अमर्त्य सेन यांना १९९८चा अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार मिळाला.
त्यांच्या कार्याचा केंद्रबिंदू कल्याण, दारिद्र्य, विषमता, सामाजिक निवड आणि मानवी क्षमता हा आहे.
महबूब उल हक यांच्या नेतृत्वाखाली मानवी विकासाचा दृष्टिकोन UNDPमध्ये १९९०पासून प्रभावी झाला.
१९९०चा Human Development Report हा या नव्या दृष्टिकोनाचा महत्त्वाचा टप्पा होता.
जपानने १८७२मध्ये आधुनिक राष्ट्रीय शिक्षणव्यवस्थेची पायाभरणी केली.
नालंदा हे प्राचीन भारतातील अत्यंत महत्त्वाचे आंतरराष्ट्रीय शिक्षणकेंद्र होते.
आधुनिक नालंदा विद्यापीठाच्या पुनरुज्जीवनाच्या प्रक्रियेत अमर्त्य सेन यांची महत्त्वाची भूमिका होती.
अंशतः बरोबर
प्रतिचीची स्थापना १९९८मध्ये झाली — नोबेल पुरस्कार १९९८चा असला तरी Pratichi (India) Trustची स्थापना १९९९ची असल्याचे संस्थेच्या अधिकृत माहितीत आहे.
जपान १९१०मध्ये पूर्णपणे साक्षर झाला — हा अचूक दावा अधिक स्वतंत्र पुराव्याने तपासणे आवश्यक आहे.
नालंदाच्या विध्वंसाची एकरेषीय तारीख व कारण सांगणे इतिहासाच्या अधिक गुंतागुंतीच्या प्रक्रियेला सोपे करते.
वादग्रस्त / लेखकाचे विश्लेषण
थॅचर–रेगन धोरणांमुळे संयुक्त राष्ट्रसंघाची गरिबाभिमुख धोरणे बदलण्यास भाग पाडली गेली, हा दावा.
“नालंदा हे एकमेव विद्यापीठ होते” हा शब्दशः दावा.
“भारत आणि पाकिस्तान मनुष्यविकासाच्या यादीत जगाच्या तळाशी आहेत” हे कोणत्या वर्षाच्या निर्देशांकाचा संदर्भ आहे यावर अवलंबून बदलणारे विधान आहे.
अमर्त्य सेन यांच्या विचारांना विशिष्ट राजकीय निर्णयांमुळे “खीळ” बसली, हा लेखातील राजकीय निष्कर्ष स्वतंत्र पुराव्याने तपासण्यासारखा आहे.
पुरावा अपुरा
“१९१०मध्ये जपान संपूर्णपणे साक्षर झाला” हा अचूक वर्षाधारित दावा.
लेखातील काही व्यक्तींच्या उद्धरणांचे शब्दशः मूळ इंग्रजी संदर्भाशी जुळणारे स्वतंत्र प्रमाणीकरण.
आदरणीय विजयजी,
अतिशय विचारप्रवर्तक, अस्वस्थ करणारा आणि पुन्हा पुन्हा वाचावा असा लेख.
तुमच्या लेखाचे मला सर्वाधिक कौतुक यासाठी वाटते की तुम्ही अवघड विषयाला अवघड भाषेत मांडलेले नाही. ससाणा, डोळा, भक्ष्य, पिल्ले, जनुके, डार्विन आणि निसर्गातील क्रौर्य या साध्या प्रतिमांमधून तुम्ही एक मोठा तात्त्विक प्रश्न वाचकासमोर ठेवला आहे.
सहेतुकता आहे की नाही, हा प्रश्न जितका महत्त्वाचा आहे; त्याहून महत्त्वाचे म्हणजे आपल्याला जगात दिसणाऱ्या ‘हेतू’चा अर्थ आपण कसा लावतो, हा प्रश्न आहे.
लेख वाचून एकच जाणवते...
निसर्गाची गूढता कमी करण्यासाठी विज्ञान जन्मलेले नाही; ती गूढता समजून घेण्याची आपली नजर अधिक प्रगल्भ करण्यासाठी ते आहे.
निसर्गाच्या अद्भुत रचनेमागे ईश्वरी हेतू आहे की उत्क्रांतीची अनाकलनीय किमया—हा प्रश्नच या लेखाला विलक्षण खोली देतो. वाचून संपणारा नव्हे, तर वाचल्यानंतरही मनात दीर्घकाळ घुमत राहणारा हा विचारप्रवर्तक लेख आहे.
आणि
निसर्ग आपल्याला उत्तरांपेक्षा प्रश्न अधिक देतो आणि कदाचित त्या प्रश्नांना प्रामाणिकपणे सामोरे जाणे, हाच खरा विवेक आहे.
सुनील घायाळ (होशिंग)