* विजय गायकवाड | Vijay Gaikawad

live

नमस्कार आपले स्वागत आहे. मी पुस्तके आणि मित्रांवर पैसे खर्च करतो,माझ्याकडे दगड आणि विटांवर खर्च करण्यासाठी पैसे नाहीत.- रस्किन बाँड.ही थोर माणसं व त्यांचे विचार मला पुस्तकात भेटलीत.ती भेटली आणि त्यांनी सांगितले कि, प्रत्येक दिवशी असं काही तरी करा की,ते तुम्हाला अधिक सुंदर उद्याच्या दिशेने खूप लांबवर घेऊन जाईल."- डोग फायरबाऊ.' सर्वियन कादंबरीकार मिलोराद पावीच यांचे एक वाक्य आहे ते म्हणतात - जोवर जगात पुस्तक वाचणाऱ्या वाचकांची संख्या बंदूकधारी सैनिका पेक्षा अधिक आहे तोवर काळजीच काहीच कारण नाही.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात.पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये.म्हणून अविरतपणे प्रयत्न करणारे मार्गदर्शक, मित्र धावून येतात.प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,डॉ.दीपक शेटे,आ.भरत बुटाले,प्रा.सर्जेराव राऊत,सुभाष ढगे,अनिल फारणे,डॉ.सुधीर सरवदे ,विश्वास खाडे, विनायक पाटील,संजय कुंभार,सतीश खाडे,मनोहर सुर्वे,गणेश खंदारे,तात्या गाडेकर, दादासाहेब गाडेकर, दादासाहेब ताजणे, पुस्तकातील घटना प्रसंग सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील यांनी केलेले आहे. मला लिहिण्याची प्रेरणा देणारी पुस्तके,लेखक,प्रकाशक,मित्र ही जगावेगळी माणसं माझ्या जीवनातील महत्वाचा टप्पा आहेत.... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ.मेघा गायकवाड, चिरंजीव मयान,माझ्या धावण्यातील गुरुवर्य नामदेव बरुरे,लुल्ला शेख मोठी ताई ,लहान ताई जयश्री शिंदे या सर्वांचेच मनापासून आभार व धन्यवाद मॅट्रिक फेल विजय गायकवाड

८/३/२६

निर्जन वाळवंटात अस्तित्वाची लढाई / The battle for survival in the desert

नवी नोकरी सुरू होण्याआधी सुट्टीवर निघालेला रिकी मेगी हायवेवर अनोळखी व्यक्तीला लिफ्ट देण्याची चूक करतो आणि जिवावरच्या संकटात सापडतो- आऊटबॅक,म्हणजे ऑस्ट्रेलियाच्या विस्तीर्ण आणि निर्जन वाळवंटात मरण्यासाठी सोडून दिलेल्या रिकीची अस्तित्वासाठी दिलेली लढाई.( रिकी मेगी,निर्जन वाळवंटात अस्तित्वाची लढाई,मृत्यू पाहिलेली माणसं,गौरी कानिटकर, समकालीन प्रकाशन )


▶ शुद्धीवर आल्यानंतर रिकीच्या लक्षात येतं की आपण एका खड्ड्यात गाडले गेलो आहोत.आपल्यावर माती आणि ताडपत्री टाकलेली आहे.कुत्री आपलं थडगं उकरताहेत...


पस्तीस वर्षांचा रिकी अंगापिंडाने दणकट असतो.सहा फूट उंच आणि १०० किलो वजन.खड्ड्यातून बाहेर यायला त्याला वेळ लागत नाही;पण बाहेर आल्यावर दिसणारं दृश्य त्याला खचवणारं असतं.दूरवर वाळवंट पसरलेलं असतं.ना कुठे रस्ता दिसत असतो,

ना मनुष्यवस्तीच्या खाणाखुणा.आपण तर बंटिन हायवेवरून हॉल्स क्रीककडे चाललो होतो.अचानक या वाळवंटात आपण कसे काय येऊन पडलो ? त्याच्या डोक्यात सगळा गोंधळ उडतो.

हे नक्कीच एखादं स्वप्न असलं पाहिजे असं त्याला वाटतं.

अन्यथा,एवढ्या भयंकर परिस्थितीत आपण कशाला सापडू? पण नंतर मात्र नेमकं काय घडलंय ते त्याला हळूहळू आठवायला लागतं.हायवेवरून जाताना आपण लिफ्ट दिलेल्या तरुण माणसाने आणि त्याच्या साथीदारांनी आपल्याला गुंगीचं औषध पाजून इथे फेकून दिलंय हे त्याच्या लक्षात येतं.आता पुढे काय याचा विचार न सुचून तो किती तरी वेळ सुन्न बसून राहतो.


ऊन वर यायला लागतं तसा वाळवंटाचा चटका बसायला सुरुवात होते.घशाला कोरड पडते.उन्हात नुसतं बसून राहणं अशक्य असतं.पण चालायला सुरुवात करायची तर ती कोणत्या दिशेने हे रिकीला कुठे माहिती असतं?आपण नेमके कुठे आहोत आणि कुठल्या दिशेने गेल्यावर आपल्याला मदत मिळेल याची त्याला काहीच कल्पना नसते.पण आसपास कुठे तरी वस्ती तर असलीच पाहिजे असं त्याला वाटतं.जवळ नाही,तर थोडं चालल्यावर का होईना,आपल्याला मदत मिळेल आणि आपण लवकरच सुखरूप घरी पोहोचू, अशी तो स्वतःची समजूत काढतो.कुठल्या दिशेने चालावं हे ठरवण्यासाठी तो त्यातल्या त्यात उंच झाडावर चढून जवळपास रस्ता किंवा एखादी वस्ती दिसते का हे बघायचा प्रयत्न करतो;पण त्याला तशी काहीही चिन्हं दिसत नाहीत.दूरपर्यंत खुरट्या झुडपांनी व्यापलेलं सपाट वाळवंट पसरलेलं असतं. 


त्याचं मन एकाच वेळी निराशेने आणि आपल्याला अशा निर्जन वाळवंटात फेकून देणाऱ्या लोकांबद्दलच्या संतापाने भरून येतं.या लोकांनी रिकीच्या पायांतले बूटही काढून घेतलेले असतात.दोन-चार वर्षांपूर्वी झालेल्या अपघातात रिकीच्या पायावर अनेक शस्त्रक्रिया कराव्या लागलेल्या असतात.तेव्हापासून लेगब्रेस घालूनच त्याला चालावं लागत असतं.ते लेगब्रेसही त्या चोरट्यांनी लंपास केलेलं असतं.माणसं इतकी निष्ठुर कशी होऊ शकतात याचं आश्चर्य करण्यापलीकडे रिकीच्या हातात काहीही नसतं. नाइलाजाने तो चालायला सुरुवात करतो,केवळ अंदाजानेच पूर्वेची दिशा पकडून.पायांत बूट आणि लेगब्रेस नसताना तापलेल्या मातीत चालणं जीवघेणं असतं.जमिनीवरचे अणकुचीदार दगड आणि खुरटी झुडपं यामुळे लवकरच त्याच्या पायांची चाळण होते. थांबत थांबत,कधी एखादं झाड लागलं तर त्याच्या अपुऱ्या सावलीत विश्रांती घेत रिकी चालत असतो.


तास-दोन तास होत नाहीत तोपर्यंत घसा पूर्ण कोरडा पडून रिकी पाण्यासाठी कासावीस होऊ लागतो. आपल्याकडे काही म्हणजे काही नाही,अगदी पाणीदेखील नाही हे रिकीच्या तेव्हा लक्षात येतं.तब्येत दणकट असल्यामुळे एखाद-दुसरा दिवस न खाता राहता येऊ शकतं,पण पाणी न पिता कसा तग धरणार? आकाशात पाहावं तर पाऊस पडण्याची काही शक्यताही दिसत नाही.शेवटी तहान जेव्हा असह्य होते तेव्हा रिकीसमोर स्वतःची लघवी पिण्याखेरीज काहीही उपाय उरत नाही.आपल्यावर ही काय वेळ आली आहे, या विचाराने त्याला स्वतःचीच दया येते.पण लवकरच तहानेने तो इतका कासावीस होतो की घसा ओला करण्यासाठी काहीही मिळालं तरी चालेल असं त्याला वाटू लागतं.पिण्यासाठी बाटली,भांडं असं काहीच नसल्यामुळे शेवटी स्वतःच्या अंडरवेअरवर लघवी करून ती तोंडात पिळण्याची वेळ रिकीवर येते.


घसा ओला झाल्यावर पुन्हा चालायला सुरुवात होते. रिकीच्या डोक्यात विचारांचं काहूर माजलेलं असतं;पण अजूनही त्या विचारांचा सगळा भर 'आता सुटका होईल की मग' यावरच असतो.हायवेवरची आपली कार कुणाला तरी मिळेल;नव्या नोकरीत रुजू होण्याआधी आपण ज्या मैत्रिणीकडे जाणार होतो ती आपली शोधाशोध करेल,पोलिसात तक्रार दाखल करेल;

आत्तापर्यंत आपला शोध सुरूही झाला असेल. आता कुठल्याही क्षणी आपली सुटका होईल...अशा विचारांत तो चालत असतो. हे विचारच त्याला चालण्याची शक्ती देत असतात.पण लवकरच सूर्य मावळतो आणि त्याच दिवशी सुटका होण्याची आशाही. 


रात्री या उघड्या माळरानावर मुक्काम करावा लागणार हे नक्की होतं.दिवसा उन्हाचा जेवढा असह्य चटका बसत असतो तेवढीच असह्य थंडी रात्री पडते,रिकी झोपण्यासाठी झुडपांची दाटी झालेली एक जागा शोधून काढतो आणि अंगावर फांद्या ओढून बसून राहतो. थंडीत झोप येणं शक्यच नसतं.त्यातच मध्यरात्री पावसाला सुरुवात होते.रिकी आनंदाने नाचू लागतो. पोटाला तडस लागेपर्यंत तो पाणी पिऊन घेतो आणि त्या पावसातच झोपी जातो.


सकाळी उठून पुन्हा चाल सुरू होते.पाऊस थांबलेला असतो आणि पावसाचं पाणी रिचवून ती रेताड जमीन पुन्हा कोरडीठक्क पडलेली असते.काही छोट्या डबक्यांमध्ये पाणी साठलेलं रिकीला दिसतं.त्यात तोंड घालून तो शक्य तेवढं पाणी पितो;पण जसजसं ऊन वाढतं,चालून चालून दमणूक होते तसतशी पाण्याची गरज वाढू लागते.घसा ओला करण्यासाठी त्याला पुन्हा कालचाच उपाय अवलंबण्याची वेळ येते.चालून चालून पाय रक्तबंबाळ झालेले असतात.दुसरा दिवसही संपत येतो;पण ना कोणी त्याची सुटका करायला येतं, ना त्याच्या नजरेच्या टप्प्यात एखादी वस्ती दिसते.दुसऱ्या दिवशी रात्री झोपण्यासाठी रिकी थोडे अधिक कष्ट घेऊन फांद्यांचं छत असलेला एक आडोसा तयार करतो.त्याही रात्री मुसळधार पाऊस पडतो आणि वाहून जातो.एवढा पाऊस पडूनही आपल्याकडे पाणी साठवायला काही नाही याचं रिकीला किती वाईट वाटत असेल याची कल्पनाच केलेली बरी.


तिसऱ्या दिवशी सकाळी चालणं सुरू केल्यानंतर रिकीला एक छोटासा चढ लागतो.त्यावर चढून चारही दिशांना वस्तीची किंवा रस्त्याची काही खूण दिसते का हे बघण्यात तो बराच वेळ घालवतो;पण व्यर्थ.पुढचा अर्धा दिवस वाटेमध्ये त्याला छोटी डबकी लागतात.ती चिखलाने भरलेली असली तरी त्यांत पाणीही असतं हे काही कमी नव्हे ! त्यामुळे प्रत्येक डबक्यातलं जमेल तेवढं पाणी पिऊन रिकी मार्गक्रमण करत राहतो.पहिले काही दिवस असेच जातात.दिवसभर मोडक्या पायांनी तंगडतोड करायची,रात्री झोपण्यासाठी चांगला आसरा तयार करायचा,रात्री पाऊस पडला की भरपेट पाणी पिऊन घ्यायचं आणि सकाळी पुन्हा चालायला सुरुवात करायची.त्या काळात रिकीच्या मनात पहिल्यांदा देवाचे विचार येऊ लागतात.रिकीचा देवावर विश्वास असतो, पण त्याचा विचार करण्याची वेळ आजवर त्याच्यावर कधीच आलेली नसते.या वेळी पहिल्यांदाच त्याच्या मनात प्रश्न उमटू लागतात... देव म्हणजे नेमकं काय,तो खरंच आपल्या आसपास आहे का,मी आता कोणत्या संकटातून चाललो आहे हे त्याला कळत असेल का, हे प्रश्न त्याला स्वतःच्या दयनीय परिस्थितीपासून लक्ष विचलित करण्यासाठी उपयोगी पडतात.


चौथ्या पाचव्या दिवशी रिकीची शक्ती कमी होऊ लागते. दुपारी उन्हाचा तडाखा सर्वाधिक असताना त्याचे पाय डगमगायला सुरुवात होते.अनेकदा डोळ्यांसमोर अंधारी येऊन आपण पडतो की काय असं त्याला वाटत असतं; पण तो स्वतःला सावरत,

विश्रांती घेत पुन्हा पुढे चालत स्वतःला खेचत असतो.एकदा मात्र त्याच्या शरीरातले त्राण संपतात आणि तो त्या तापलेल्या मातीवर लोळण घेतो.आपण किती वेळ तिथे पडलेलो आहोत याचं त्याला भान नसतं.थोड्या वेळाने त्याला भास होतो की त्याची जुनी मैत्रीण ज्युली त्याला हाक मारते आहे. त्याला कळत नाही,या वाळवंटात अचानक ज्युली कुठे आली? तो डोळे किलकिले करून बघतो,तर ती त्याला हात देऊन उठवण्याचा प्रयत्न करत असते.'ऊठ,थांबून चालणार नाही.तुला चालत राहायला हवं',असं म्हणत असते.रिकी खरोखर उठून पुन्हा चालू लागतो.आपल्या अंगातली शक्ती पूर्ण संपलेली असताना आपण कसे चालतो आहोत हे त्याचं त्यालाही कळत नाही.हा भास म्हणजे नेमकं काय होतं याचा विचार करण्याची शक्तीही त्याच्याकडे नसते.पण 'जो स्वतःला मदत करतो त्यालाच देवही मदत करतो' हे लहानपणी ऐकलेलं वचन खरं होतं तर, असं त्याच्या मनात येतं. या प्रसंगानंतर तो देवाची खऱ्या अर्थाने प्रार्थना करतो.तो म्हणतो, 'देवा, मला मदत कर.मी तुला कुठलाही चमत्कार घडवायला सांगत नाहीये.फक्त मी जगावं असं या जगात कुणाला तरी वाटतं आहे ना,एवढं मला सांग.'


अंगातली शक्ती संपून आता दिवस उलटलेले असतात. आता आपली सुटका कशी होईल,या विचारापेक्षा आपल्याला पाणी कसं मिळेल,या विचाराने रिकीचं मन व्यापलेलं असतं.कुठेही थोडी ओली जमीन दिसली की त्याखाली खणून तो पाण्याचे काही थेंब मिळवण्याचा प्रयत्न करत असतो,झाडांच्या पानांवरचा ओलावा चाटत असतो.चार-पाच दिवसांच्या पायपिटीनंतर त्याला पायाखालची जमीन बदललेली जाणवू लागते. जमिनीतला ओलावा वाढलेला असतो.त्याला छोटी छोटी डबकी दिसू लागतात आणि त्या डबक्यांचा माग रिकीला चक्क एका छोट्या नदीपाशी घेऊन जातो. स्वच्छ पाण्याने भरलेली वाहती नदी! एवढं पाणी पाहून त्याचा पहिला प्रतिसाद असतो,की आता आपल्याला आणखी काहीही मिळालं नाही तरी चालेल.त्यानंतर कित्येक तास तो नदीत डुंबून पाणी पीत राहतो.आता नदीच्या किनाऱ्यावरून तिच्या प्रवाहांसोबतच पुढे चालत राहायचं ठरवतो.तापलेल्या जमिनीवरून, काट्याकुट्यांतून चालण्यापेक्षा ते किती तरी चांगले असे त्याला वाटतं पण प्रत्यक्षात तो चालायला सुरुवात करतो तेव्हा मात्र लक्षात येतं.की जमिनीवर काटेकुटे आणि दगड असतील तर नदीचं पात्रही कमी धोकादायक नाही.त्यातून चालणंही रिकीच्या पावलांसाठी तितकंच प्रासदायक ठरतं.पण जमेल तेवढं पोहत जमेल तेवढं पाण्याच्या प्रवाहासोबत वाहत रिकी पुढे जात राहतो.पाण्याजवळ असण्याचा दुसरा त्रास असतो तो डास आणि पिसवांचा.त्यांच्या झुंडीच्या झुंडी रिकीच्या अंगाभोवती घोंघावत त्याला फोडून काढायला सुरुवात करतात.


नदीच्या एका वळणावर रिकीला पहिल्यांदाच काही मानवनिर्मित खुणा दिसतात.ती एक पवनचक्की असते. ज्याअर्थी इथे पवनचक्की उभारलेली आहे त्याअर्थी इथे कोणी ना कोणी तरी येत असणार.आजच नव्हे,पण किमान एक-दोन दिवसांत कोणी तरी नक्की इथे येईल आणि आपली सुटका होईल अशी रिकीला आशा वाटते.त्यामुळे ती रात्र तो या पवनचक्कीपाशी काढायचं ठरवतो.आपण पवनचक्कीच्या पात्यांखालच्या प्लॅटफॉर्मवर बसलो तर वरून लांबवरचं दृश्य दिसेल आणि डासांपासून सुटका होईल,या विचाराने रिकी तिथे जाऊन बसतो.डास आणि पिसवांचा त्रास थोडा कमी होतो पण पूर्ण संपत नाही.ती रात्र तो तिथेच काढतो. दुसऱ्या दिवशी वरून त्याला पवनचक्कीची डझनभर पाती पडलेली दिसतात.त्याच्या डोक्यात येतं,त्यांचा उपयोग करून रात्रीसाठी आसरा तयार करावा.रात्रीचा पाऊस आणि डासांपासून सुटका करून घेता आली तर या नदीशेजारी राहण्यासारखं सुख नाही,असा विचार तो करतो.चार दिवस मेहनत करून तो पवनचक्कीच्या पात्यांपासून एक छोटं खोपटं तयार करतो.रात्री मुसळधार लागली तर ते खोपटं गळत असतं,पण तरीही मिळालेला आसराही रिकीसाठी लाख मोलाचा असतो. या खोपटात तो बरेच दिवस काढतो.त्या काळात तिथे जोरदार पाऊस पडतो.त्यामुळे त्या काळात सुटकेची शक्यता अशी नसतेच.पण पाऊस कमी झाल्यावरही तिथे कोणी फिरकत नाही म्हटल्यावर आता पुन्हा पुढे जाण्याची वेळ आली आहे,असं रिकी स्वतःला पटवतो आणि चालू लागतो.निघण्याआधी पवनचक्क्यांच्या पात्यांपासून SOS चं चिन्ह काढून ठेवायला तो विसरत नाही.


मधल्या काळात त्याच्या शरीराला थोडी विश्रांती मिळालेली असते,नदीच्या किनारी उगवलेलं कोवळं गवत खायला मिळालेलं असतं;पण त्यामुळे उलट रिकीच्या पोटातली भुकेची भावना वाढीस लागते.


◆◆◆ अपूर्ण ■■■

६/३/२६

शार्लमन / Charlemagne

महंमदाच्या मरणानंतर पुष्कळशा शतकांनंतर हे जग मुसलमान व ख्रिश्चन यांच्यामधील युद्धभूमी झाले.मशीद व चर्च यांमध्ये लाजिरवाणी स्पर्धा सुरू झाली होती.शरीरे मारून मानवी मनाचा ताबा कोणी घ्यायचा याबाबत या दोघांमध्ये शर्यत लागली होती.वास्तविक पाहता,खरा मुसलमान ईश्वरशरण असतो,व खरा ख्रिश्चन शांतीचे उपनिषद् मानतो. पण अनुयायी मिळविण्याच्या स्पर्धेत दोघांनाही आपापल्या सत्यधर्माचा विसर पडला.या दोन्ही धर्मांस उगाच नावे ठेवायची अशातला भाग नाही. नेहमीच तलवारीने धर्म लादला गेला असे नाही. कितीतरी मुसलमान व (शार्लमन : पोपला वाचवून स्वतः सम्राट होणारा,

मानवजातीची कथा,हेन्री थॉमस,अनुवाद - सानेगुरुजी, मधुश्री पब्लिकेशन)


खिश्वन असे होते की,त्यांनी आपल्या उदार व उदात्त वर्तनाने परधर्मीयांमध्ये ईश्वरशरणागतीचा सुंदर मुस्लीम धर्म व प्रेमाचा खिश्चन धर्म यांचा प्रसार केला.पण त्या त्या धर्मानुयायांचे पुढारी महत्त्वाकांक्षी असत,त्यांना कशाचीही दिक्कत नसे. धर्माच्या मिषाने,धर्माच्या बुरख्याखाली व ईश्वराच्या नावाने ते स्वार्थ साधू पाहत.महंमदानंतर जे मुस्लीमांचे खलिफा झाले,त्यांनी मुस्लीम धर्म व मुस्लीम सत्ता रक्ताने सर्वत्र चालू करण्याचे व्रत उचलले.आफ्रिकेचा उत्तर भाग व युरोपातील स्पेन देश वगैरेंकडे हाती तलवार घेऊन ते दयाळू अल्लाचे भीषण वैभव पसरवीत चालले.ख्रिश्चन धर्मीय राजांनीही प्रेमसिंधू येशूचा धर्म पश्चिम युरोपभर रक्ताने शिकविला.

मुसलमान आपला धर्म वर उत्तर फ्रान्समध्ये नेऊ लागताच खाली स्पेनमध्ये येणाऱ्या ख्रिश्चनांशी त्यांची झटापट झाली.महंमदाच्या मरणानंतर बरोबर शंभर वर्षांनी टूर्स येथे झालेल्या मोठ्या लढाईत शार्लमनचा आजा चार्लस मार्टेल (मार्टेल = धाव घालणारा) याच्या सेनापतित्वाखाली लढणाऱ्या ख्रिश्चनांचा विजय झाला.


चार्लस मार्टेल हा फ्रान्सच्या राजाचा मुख्य प्रधान होता.त्या वेळचे फ्रेंच लोक आजच्या फ्रान्समध्ये व जर्मनीमध्ये राहत होते;फ्रान्समध्ये राहणारे ज्या भाषेतून पुढे आजची फ्रेंच भाषा बनली,ती भाषा बोलत व जर्मनीत राहणारे फ्रेंच ज्या भाषेतून पुढे आजची जर्मन भाषा बनली,ती 'टिओटिक' म्हणजे 'जनतेची भाषा' बोलत.अशा रीतीने भाषांत फरक होते,तरी प्रसंगी फ्रेंच व जर्मन एकच होते,दोघांचा राजाही एकच होता.चार्लस मार्टेलच्या वेळी राजा केवळ नामधारी होता.मुख्य प्रधानच सर्वसत्ताधीश अनभिषिक्त हुकूमशहा होता.टूर्स येथे फ्रँकांनी मुसलमानांचा पराजय केला त्याचे श्रेय राजाकडे न जाता चार्लस मार्टेल यालाच मिळाले.'ख्रिश्चन धर्माचा त्राता','ख्रिस्ताचे नाव राखणारा',म्हणून त्याचा गौरव करण्यात आला. इटलीतील लंबार्डियन लोक ख्रिश्चन शिकवण मानीत नव्हते,म्हणून त्यांच्यावर स्वारी करण्यासाठी पोपने मार्टलला गौरवपूर्वक बोलावले;पण पोपला साह्य करण्यापूर्वीच मार्टल मरण पावल्यामुळे ते काम 'ठेंगणा पेपिन' नावाच्या त्याच्या मुलावर पडले.तो फ्रैंकाच्या राजाचा मुख्यमंत्री होता;पण मुख्य प्रधानकीवर त्याला समाधान नव्हते;राजा होण्याची त्याची महत्त्वाकांक्षा होती.इटलीत जाण्यापूर्वी ज्याच्या हाती खरोखर खरी राजसत्ता आहे,

त्यानेच राजा का होऊ नये?"असा मोठा मुत्सद्देगिरीचा व सूचक प्रश्न त्याने पोपला केला. पोपने होकारार्थी उत्तर पाठवून फ्रँकांचा राजा "चाइल्डेरिक" याला भिक्षू होण्यास सांगितले व पेपिनला 'ईश्वराच्या कृपेने झालेला फ्रँकांचा राजा' म्हणून गादीवर बसविले


पोपच्या या उपकाराची परतफेड म्हणून पेपिनने इटलीवर स्वारी केली व लंबार्डीतील लोकांना जिंकून त्यांची अनेक शहरे पोपला भेट म्हणून दिली.'पेपिनची देणगी' या नावाने ही भेट प्रसिद्ध असून हिच्या योगानेच चर्चच्या ऐहिक वैभवाचा, पृथ्वीवरील सत्तेचा प्रारंभ झाला.यापूर्वी पोप केवळ काल्पनिक अशा स्वर्गातील राज्यातच दंग असत; पण यानंतर ते पृथ्वीवरच्या खऱ्याखुऱ्या धनदौलतीत रस घेऊ लागले.

चर्चचे व स्टेटचे लग्न लागले,पेपिनच्या देणगीपासून सुमारे हजार वर्षे चर्चने जगावर प्रभावी वर्चस्व गाजविले,व ते बव्हंशी शापप्रद व दुःखदायकच होते.


ठेंगू पेपिन इ.स. ७६८ मध्ये मरण पावला व त्याचा मुलगा शार्लमन हा न्यूस्टिया व आस्ट्रेशिया म्हणजे आजचे फ्रान्स व जर्मनी यांचा राजा झाला.शार्लमन या शब्दाचा अर्थ मोठा चार्लस शार्लमन पित्याप्रमाणेच महत्त्वाकांक्षी वीर होता,

चर्चचा कड़वा रखवालदार होता.उत्तर स्पेनमध्ये त्याने सारासीन मुसलमानांचा पराजय केला. सारासीनांना युरोपातून संपूर्णपणे हाकलून देण्याचा प्रयत्न त्याने केला;पण त्याला त्यात यश आले नाही.ही जी पवित्र युद्धे चालली होती,त्यांचा परिणाम म्हणून शेवटी मुसलमान व ख्रिश्चन यांच्या दरम्यान पिरनीज पर्वत ही हद्द ठरली.दक्षिण स्पेनची सत्ता मुसलमानांनी आपल्या हाती ठेवली.ख्रिश्चन लोक शार्लमनच्या पवित्र मुठीच्या संरक्षणाखाली उत्तरेकडे,तद्वतच पूर्व युरोपभर पसरले.न्यूस्ट्रिया,आस्ट्रेशिया,क्रिशिया,

अक्विटेनिया,बर्गंडी, बव्हेरिया, लंबार्डी,सॅक्सनी इत्यादी सर्व प्रदेशांवर शार्लमनची सत्ता प्रस्थापित झाली.शार्लमनला सॅक्सनीबरोबरच बरीच लढत द्यावी लागली.तेथील लोक बरेच हट्टी होते.ते एकदम नवीन धर्म पत्करीनात.पण शार्लमनने एका दिवसांत साडेचार हजार लोकांची कत्तल करून शेवटी त्यांच्या गळी ख्रिश्चन धर्म उतरविलाच.जे जिवंत राहिले,त्यांनी ख्रिस्त हा दयाळू आहे हे मुकाट्याने कबूल करून बाप्तिस्मा घेतला व ख्रिश्चनांचा धर्म स्वीकारला.


इ.स. ७९९ मध्ये शार्लमनला जरा नाजूक कामगिरी करायची होती.पोप तिसरा लिओ याच्यावर व्यभिचाराचा आरोप करून स्थानिक संस्कृतिसंरक्षकांनी त्याला मरेमरेतो ठोकले.शेवटी, तो आश्रयार्थ एका मठात गेला.त्याने शार्लमनची मदत मागितली.शार्लमन हा धर्माचा परित्राता होता, संघटित चर्चचा संरक्षक होता.शार्लमनने गुन्ह्याची चौकशी करून पोप निर्दोषी आहे,असे जाहीर केले. पोप खरोखर गुन्हेगार होता की नाही,हा भाग वेगळा;पण न्यायाधीश म्हणून बसण्याला मात्र शार्लमन लायक नव्हता.कारण तो निष्ठावंत ख्रिश्चन असला,तरी त्याच्या आवडीनिवडी मुसलमानी होत्या.त्याच्या चार बायका होत्या,पाच रखेल्या होत्या,त्याला सतरा मुले होती,

त्यांपैकी बरीच अनौरस होती.पण त्याने पोपला निर्दोष ठरविल्यामुळे पोपचे कल्याण झाले,त्याचप्रमाणे त्याचा स्वतःचाही फायदा झाला. इ.स. ८०० च्या नाताळच्या दिवशी तो सेंट पिटरच्या चर्चमध्ये प्रार्थना करीत असता एकदम पोप लिओ जणू काय दैवी प्रेरणा झाल्याप्रमाणे तिथे आला व त्याने शार्लमनच्या मस्तकावर सुवर्णमुकुट ठेवला. शार्लमन चकित झाला,निदान वरपांगी तरी त्याने आश्चर्यचकित झाल्यासारखे दाखविले.वास्तविक, त्या क्षणाची तो वाटच पाहत होता.तो मुकुट तयार झाल्याचे,तद्वतच पोप त्या दिवशी त्याच्या डोक्यावर ठेवणार असल्याचे,त्याला माहीत होते.तो जणू प्रार्थनेतच तन्मय झाला होता,प्रभुचितनात एकरूप झाला होता! त्याच्या डोक्यावर मुकुट ठेवला जाताच त्याने चकित होऊन डोळे उघडले.


नाटक बेमालूम वठले.प्रभूने जणू शार्लमनला सम्राट बनविले.प्रभूनेच पोपला ऐन वेळी स्फूर्ती दिली, असे सर्वत्र बोलले जाऊ लागले.शार्लमन अती पवित्र व देवाचा लाडका म्हणून मानला जाऊ लागला.जुन्या रोमन साम्राज्याची पुनर्स्थापना करून विजयी ख्रिस्ताच्या नावे नवे राज्य स्थापण्यासाठी शार्लमनची ईश्वरानेच निवड केली असे सर्वजण म्हणू लागले.शार्लमनला बाहत्तर वर्षांचे आयुष्य लाभले.त्याने मठ बांधले,लॅटिन भाषेच्या व्याकरणात ढवळाढवळ केली व त्याला नीट लिहिता-वाचता येत नव्हते,तरी ज्योतिष व तत्त्वज्ञान या विषयांतही त्याची लुडबूड चालूच होती!न ऐकणाऱ्यांच्याही डोक्यात सोटे मारून तो बायबल कोंबू पाहत होता.तो दारू पित होता; मांसाच्या मिटक्या मारीत होता;परधर्मीयांना स्वधर्मात आणीत होता,त्यांच्या बायकांस आपल्या विलासस्थानी नेत होता.ईश्वराची पूजा करीत होता व बेकायदा मुलेही पैदा करीत होता.अशा लीला करीत इ.स. ८१४मध्ये या स्वारीने देह ठेवला.पुढे तीनशे वर्षांनी ख्रिश्चन चर्चने त्याच्या कामगिरीचा गौरव करून त्याला संत केले.पण ख्रिस्ताने अशांचा अंतर्भाव आपल्या मित्रांत खचित केला नव्हता.ख्रिश्चन धर्म वाढविण्याची त्याला इतकी तहान लागली होती की,त्या भरात ख्रिस्ताच्या शिकवणीचा आत्माही तो विसरून गेला.ईश्वराच्या नावाआड स्वतःची पापकृत्ये लपविणाऱ्या दांभिक गुंडांमधला तो मुकुटमणी होता !


◇◇◇ समाप्त..◇◇◇


४/३/२६

चिम्पॅन्झी व जेन गुडाल / Chimpanzees and Jane Goodall

जेन गुडाल हिचा जन्म लंडन येथे १९३४ साली झाला.तिचं शिक्षण बोर्नमाऊथ इथं झालं.तिचे वडील पेशाने इंजीनिअर होते.दुसऱ्या महायुद्धाला सुरवात होताच त्यांना फ्रान्स व नंतर मलायात पाठवण्यात आले.तेव्हा तिची आई- वान्ने ही जेन व दुसऱ्या मुलीला घेऊन खेड्यात राहणाऱ्या आईकडे राहायला गेली.त्यावेळी जेन पाच वर्षांची होती. कोंबडीच्या खुराड्यात स्वतःला कोंडून घेऊन कोंबडी अंडी कशी घालते हे तासन्तास पाहत राही.तिच्या आईला ते ठाऊक नसे.ती घाबरून जाई व पोलिसांकडे जेन हरविल्याची तक्रार नोंदवी.


जेनला प्राण्यांविषयीची पुस्तके आवडत.विशेषतः ह्यूग लॉफ्टिंग याचे डॉक्टर डू लिटज याच्या साहसकथा तिला खूप आवडायच्या.एका प्रसंगी ते आफ्रिकेतील हजारो माकडांना झालेल्या साथीच्या रोगापासून मुक्त करायला जातात.जेन ही आठवण सांगताना लिहिते "त्यावेळी मी आठ वर्षांची असेन. तेव्हापासून मला वाटे,की आपणाला आफ्रिकेतील वन्य प्राण्यांबरोबर राहायचं आहे."


अठराव्या वर्षी शाळा सोडून ती लंडन येथील एका फिल्म स्टुडिओत कामाला लागली.तिच्या वर्गमैत्रिणीचे आईवडील केनिया येथे शेती करीत.या मैत्रिणीनं जेनला केनियाला येण्याचं आमंत्रण दिलं.तिने ते लगेच स्वीकारलं.नैरोबी येथे तिची भेट प्रसिद्ध मानववंश शास्त्रज्ञ लुई लिके यांच्याशी झाली.ते त्यावेळी केनिया येथील नॅचरल हिस्ट्री म्युझियमचे क्युरेटर होते.त्यांनी तिला सचिव म्हणून कामावर घेतलं.१९५७ साली त्यांनी टांगानिका सरोवराच्या किनाऱ्यावर टांझानिया येथे आढळून येणाऱ्या चिम्पॅन्झीचं अनेक महिने ती निरीक्षण करू शकेल काय,असं तिला विचारलं. आलेल्या या अनपेक्षित संधीनं तिचं मन हरखून गेलं. लिके यांनी या योजनेसाठी आवश्यक तो पैसा मिळवला.ती इंग्लंडला परत गेली आणि तिथल्या समृद्ध ग्रंथालयातून चिम्पॅन्झी या विषयावरील जेवढी पुस्तकं मिळतील तेवढी अठरा महिन्यांच्या काळात तिनं वाचली.


जून १९६० साली जेन आईला सोबत घेऊन आफ्रिकेत पोचली.त्या वेळी वान्ने गुडालचं वय ८४ वर्षांचं होतं. चिम्पॅन्झीच्या गॉम्बे संरक्षण क्षेत्रात【चिम्पॅन्झी बरोबर राहणारी जेन गुडाल,शब्दांचं धन,मारुती चितमपल्ली, प्रकाशक,मकरंद कुलकर्णी,साहित्य प्रसार केंद्र,सीताबर्डी,नागपूर】पहिल्या आगमनाची आठवण अजूनही ती विसरली नव्हती.टांगानिका सरोवराकाठची मोकळी जागा तेथील वनरक्षकांनी दाखविली.तिथं त्या मायलेकीनं राहण्यासाठी राहुटी उभी केली.


आई म्हणते "तिथल्या किनाऱ्यावर बबून माकडं खेळत होती.बाकी जिकडे तिकडं विलक्षण सामसूम.आम्ही गर्दीपासून खूप दूर आलो होतो."


सूर्य उगवताच जेन रोज ७६० मीटर उंच असलेल्या पर्वत शिखरावर चढे.तेथून ती जंगलातल्या चिम्पॅन्झीचा शोध घेई.किती तरी आठवडे गेले.तिला त्याचं फक्त दुर्बिणीतून निसटतं दर्शन होई.म्हणून ती रात्र रात्र त्या शिखरावर मुक्कामाला राही.तिला बघताच चिम्पॅन्झी पोबारा करीत. गोम्बेला येऊन आठ महिने झाले.जेन नित्याप्रमाणे जंगलातून वर वर चढत होती,तर तिच्या वाटेवर समोर चिम्पॅन्झी बसलेला.जवळच वरच्या एका फांदीवर बसलेल्या नराचा तिनं हू असा आवाज ऐकला. तिच्या डाव्या बाजूला सळसळ ऐकू आली अन् समोर चमकणारे काळे डोळे दिसले.तिच्या मागेच हू असा दुसरा आवाज आला.चिम्पॅन्झीच्या कळपानं तिला घेरलं होतं.झाडावर बसलेल्या चिम्पॅन्झीनं एकमात्र हा ऽ आऽ आह अशी आरोळी ठोकताच जेन भीतीनं गर्भगळित झाली.तो जोरजोरानं फांदी हलवीत होता.इतर चिम्पॅन्झीनं त्याच्या आवाजाचं अनुकरण केलं. कावरी-बावरी झालेली जेन एका ठिकाणी दबा धरून बसली.रागानं अनावर झालेला,साऱ्या अंगावरले केस ताठ झालेले असा एक चिम्पॅन्झी झुडपांतून सरळ तिच्यावर धावला.नंतर वळून त्यानं जंगलाची वाट धरली.सारे चिम्पॅन्झी त्याच्या मागे निघून गेले.


जेन या प्रसंगाविषयी लिहिते "कशी तरी मी उठून उभी राहिले.त्या जंगलात फक्त माझ्याच हृदयाच्या ठोक्यांचा आवाज येत होता." तिची भीती पार उडाली.आलेल्या अद्भुत अनुभवाची तिला मौज वाटली.तिला वाटलं त्या चिम्पांझींना आता तिची भीती वाटत नाही.त्यांनी तिला स्वीकारलं आहे.


खरा प्रसंग पुढं घडला.राखी पांढरी दाढी असलेल्या एका रुबाबदार नराने तिच्या राहुटीतील केळी पळवली. त्याचं नाव तिनं दाढीवाला डेव्हिड असं ठेवलं.नंतर काही दिवसांनी तो आपल्या दोघा सोबत्यांबरोबर तिच्या अगदी जवळ आला.पहिल्यांदा जेन इतक्या जवळून चिम्पॅन्झीला बघत होती.दाढीवाल्या डेव्हिडनं आपसात खरा संवाद साधण्याची संधी पहिल्यांदा जेनला दिली होती.ओढ्याकाठी असलेल्या डेव्हिडचं ती निरीक्षण करीत होती.


तिनं एक पिकलं फळ उचललं आणि तळहातावर ठेवून तो त्याच्यापुढं केला.त्यानं त्या हाताकडं पाहिलं,नंतर तिला बघितलं.तो तिच्याजवळ आला.त्यानं आपला हात तिच्या हातावर ठेवला.काही क्षण तिचा हात हळुवार दाबला.या अभूतपूर्व प्रसंगाविषयी ती लिहिते "त्यानं मला दिलेल्या आश्वासनाचं शास्त्रीयदृष्ट्या कसलं स्पष्टीकरण करणार! माझ्या अपेक्षेपेक्षा मला फार मोठं श्रेय मिळालं होतं."


गोम्बेच्या जंगलात केलेली जेन गुडालची संशोधनं आणि अभ्यासपूर्ण निरीक्षणे लिकेनं प्रसिद्ध केली.तिनं रानटी चिम्पॅन्झीवरची निरीक्षणे चालू ठेवली.आता गोम्बे, राष्ट्रीय उद्यान म्हणून ओळखलं जातं.


१९६१ सालापर्यंत तिनं चिम्पॅन्झीच्या वर्तणुकीविषयी असामान्य ज्ञान अवगत केलं होतं.एवढ्या संशोधनाच्या आधारे केम्ब्रिज विद्यापीठात तिला इथॉलॉजी वर्तणुकीवर पीएच.डी.करण्याची परवानगी मिळाली. १९६२ साली तिला इंग्लंडला जाण्याची परवानगी दिली. तिथल्या अठरा महिन्यांच्या वास्तव्यात चिम्पॅन्झीवरील प्रबंध विद्यापीठाला सादर करून ती परत गोम्बे राष्ट्रीय उद्यानात दाखल झाली.आचार्य ही पदवी मिळाल्यावर आता सारं काही संपलं,असं तिला वाटलं नाही.


चिम्पॅन्झीविषयी जेनला जेवढं ज्ञान प्राप्त झालं,तेवढं क्वचितच कुणाला असेल.आयुष्यातील तीन तपं ती आफ्रिकेच्या घनदाट जंगलात राहिली.६५ वर्षांच्या वयातही जेनला वृद्धापकाळानं स्पर्श केला नव्हता.त्या वेळीही ती एखाद्या तरुणीसारखी दिसे.ती रोज पहाटे उठून जंगलाची वाट धरायची. तासन्तास ती चिम्पांझींचं निरीक्षण करायची.कित्येकदा अनेक दिवस त्यांच्या जीवनक्रमाचं अवलोकन करी.ते खातात काय,भितात कशी,प्रेम कसं,मातापित्यांचं वात्सल्य कसं,मृत्यू कसा- इत्यादी त्यांच्या जीवनाच्या अनेक पैलूंवरील दुर्मिळ निरीक्षणाच्या तिनं नोंदी केल्या आहेत.आजतागायत तिनं सहा ग्रंथांची निर्मिती केली आहे.शेकडो निबंध लिहिले आहेत.एखाद्या वन्य प्राण्याविषयी इतकं दीर्घकाळ संशोधन कोणी केलं नाही.


चिम्पॅन्झीवर लिहिलेल्या प्रबंधावरून तिनं 'इन द शेंडो ऑफ मॅन' हा ग्रंथ १९७१ मध्ये सिद्ध केला. या ग्रंथाचा सतरा भाषांत अनुवाद झाला आहे.शास्त्रज्ञ आणि सामान्य रसिक वाचक अशा सर्वांना तो सारखाच आवडला.चिम्पॅन्झीविषयी तिला अवगत झालेलं ज्ञान तिनं मोठ्या लालित्यपूर्ण भाषेतसादर केलं आहे. शास्त्रीय विधानं करताना कुठंही दुर्बोधता येऊ दिली नाही.तिचं सारं लेखन निर्मितीच्या पातळीवर जातं.

चिंतनाद्वारे तिला झालेलं जीवनदर्शन सोप्या, साध्या,सरळ भाषेत प्रकट केलं आहे.


"तिच्या लेखनात शास्त्रज्ञाची शिस्त व माणसांची संवेदना दिसून येते," असे अनेक विद्वान शास्त्रज्ञांनी तिच्या लेखनाविषयी अभिप्राय व्यक्त करताना लिहिले आहे. 'द चिम्पॅन्झी ऑफ गोम्बे' हा ग्रंथ १९८६ मध्ये प्रसिद्ध झाला.

त्यात ज्या चिम्पॅन्झीच्या कळपाचा तिनं अभ्यास केला,

त्यातील प्रत्येकाला त्यांच्या स्वभावानुसार नावे दिली आहेत.प्रत्येकाला ती नावानं ओळखत असे.


या तिच्या उत्कृष्ट ग्रंथाने विक्रीचा उच्चांक गाठला.तिचं तिसरं पुस्तक १९८९ साली प्रसिद्ध झालं.या साऱ्या ग्रंथांतून सचित्र पुराव्यानुसार चिम्पॅन्झीचा जीवनवृत्तान्त दिला आहे.पूर्वसूरींनी चिम्पॅन्झीच्या वर्तणुकीविषयी जी गृहिते व्यक्त केली होती,त्यांना तिनं आपल्या संशोधनाने छेद दिला आहे.विकल,वुल्फी,सैतान व स्प्राऊट यांची तिनं दिलेली शब्दचित्रं जगातील शास्त्रज्ञ आणि सामान्य वाचकांना आवडली.


१९६३ साली तिनं दाढीवाल्या डेव्हिडचं निरीक्षण केलं.ती त्याला चांगलं ओळखत होती.त्यानं एकदा सुळ्या दातांनी मृत रानडुकरांची चिरफाड करून त्याचं मांस खाल्लं.रानटी चिम्पॅन्झीनं मांस खाल्याची ही पहिली नोंद.नंतर तिनं निरीक्षणाच्या आधारे सिद्ध केलं की,चिम्पॅन्झी हे माकडं,

रानडुकरं व हरणाची पाडसं खातात.ते कळपानं शिकार करतात व नंतर मांस वाटून खातात.


माणसाला बुद्धी असते म्हणून शिकारीसाठी हत्यार वापरतात असं नव्हे;तर चिम्पॅन्झीदेखील त्याचा उपयोग करतात.एकदा दाढीवाल्या डेव्हिडनं गवताची लांब काडी तोडली अन् वारुळाच्या छिद्रात घातली.लगेच ती बाहेर काढली.त्यावर वाळवी होती.ती लगेच त्यानं खाल्ली.आणखी एक हत्यार चिम्पॅन्झी उपयोगात आणतात.ते आहे पानांचा चोथा.जंगलात ढोली असलेले वृक्ष असतात.त्यात पावसाचं पाणी साठतं.परंतु,ते पाणी खोलात असल्यानं पिता येत नाही.त्यासाठी एक युक्ती करतात.मूठभर पाला चावून त्याचा चोथा झाला,की ढोलीतल्या पाण्यात टाकतात.चोथा पाण्यानं ओला होतो.ढोलीतून तो काढून त्यातील पाणी चिम्पॅन्झी शोषून घेतात.जेन म्हणते,"कुठल्याही इतर प्राण्यापेक्षा चिम्पॅन्झी अनेक प्रकारच्या वस्तू अनेक कारणास्तव उपयोगात आणतात.अशी बुद्धी फक्त माणसाजवळ आहे." चिम्पॅन्झीविषयी अनेक वर्षांच्या संशोधन आणि अभ्यासानंतर तिला आढळून आलं,की त्यांच्यात आणि मानवाच्या स्वभावात साम्य आहे.ती म्हणते, "जीवशास्त्रीय उत्पत्ती अथवा जननशास्त्राचा विचार केला,तर चिम्पॅन्झी आणि मानवात नव्वद टक्के साम्य आहे.तसेच त्यांच्या आणि आपल्या जीवनचक्रात साधर्म्य आहे.षनःहबाल्यावस्था पाच वर्षे,पौगंडावस्था नऊ ते तेरा वर्षे,प्रजोत्पत्ती व वृद्धापकाळ पस्तीस किंवा चाळीस वर्षे आणि रानटी अवस्थेत पन्नासाव्या वर्षांच्या आसपास मृत्यू."


आपल्याप्रमाणे चिम्पांझींच्या स्वभावातही भय,दुःख, राग,लोभ व असूया हे गुण आहेत.मित्र आणि परिवाराशी अनेक पिढ्यांचे स्नेहसंबंध असतात.जेनला आढळून आलं,

की चिम्पॅन्झी माता आपल्या लहान पिलाला छातीशी धरून गोंजारतात.दीर्घ काळाच्या ताटातुटीनंतर मित्र उराउरी भेटतात.हस्तांदोलन करतात. पिलं हात पसरून अन्नाची भीक मागतात.त्यांचे दुःखदेखील आपल्याइतकेच खरे आहे.जेव्हा फ्लो या वृद्ध मातेने खाली कोसळून प्राणत्याग केला,तेव्हा तिचा मुलगा फ्लिंट तिच्या प्रेताजवळ अनेक दिवस बसून होता. लवकरच त्यानं अन्नत्याग केला.तिच्या मृत्यूनंतर एका महिन्यानं शोकाकुल अवस्थेत आईनं जिथं देह ठेवला होता तिथंच त्यानं प्राण सोडला.


या ग्रंथात एक हृदयस्पर्शी प्रसंग आहे.चिम्पांझींना नवबालकांचं मोठं कौतुक वाटतं.कळपातील साऱ्या जणांचा या बालकांवर लोभ असतो.त्याला कुठं ठेवू अन् कसं करू असं वाटतं.एका चिम्पॅन्झी मातेला वाटलं,की आपलं बाळ जेनला दाखवावं,म्हणून ती जेनचा परकर ओढू लागते.तिच्या या वागणुकीचं तिला आश्चर्य वाटतं.

म्हणून जेन तिच्या मागोमाग जाते.ती एका झुडपाजवळ थांबते.माता त्या झुडपातून पिलाला बाहेर काढून जेनला दाखवते.या प्रसंगावरून असं वाटतं,की जेन चिम्पांझींच्या जीवनाशी किती एकरूप झाली होती, तिनं त्या वन्य प्राण्यांचा किती विश्वास संपादन केला होता! नाही तर वन्य प्राणी आपल्या पिलाजवळ माणसाला अजीबात येऊ देत नाहीत.


युरोप आणि अमेरिकेतून डझनावरी विद्यार्थी तिच्याबरोबर सहायक म्हणून काम करायला आले. परंतु,ही योजना अकस्मात मे १९७५ साली बंद करण्यात आली.त्याचं कारण असं घडलं,की काही आतंकवादी शस्त्रे घेऊन टांगानिका सरोवराच्या शिबिरात आले.बंदुकीच्या नळीसमोर तिथल्या चौकीदाराला धरून त्यांनी जेन गुडालचा ठावठिकाणा विचारला.परंतु,त्यानं सांगायचं नाकारलं,तेव्हा त्या हल्लेखोरांनी तिघा अमेरिकन व डच संशोधकांना गौर येथे पळवलं.दोन महिने त्यांना खंडणीसाठी तिथं डांबून ठेवलं आणि भरपूर खंडणी मिळाल्यावर त्यांना सोडून देण्यात आलं.या जीवघेण्या प्रसंगानंतर गोम्बे येथे परदेशी संशोधक येईनासे झाले.परंतु,न डगमगता धैर्यानं जेननं टांगानिका येथील रहिवाशांना क्षेत्र सहायकांचे शिक्षण देऊन संशोधनासाठी संघ तयार केला.आज तिथं निष्ठेने काम करणाऱ्या बावीस जणांचा संघ कार्यरत आहे.जेन त्या सहायकांविषयी म्हणते, "त्या साऱ्यांचं चिम्पॅन्झीवर माझ्याइतकंच प्रेम आहे.आपल्या खेड्यात ते चिम्पॅन्झीविषयी बोलतात आणि आपल्या परिवाराला त्यांच्या हालचाली बघण्यासाठी आणतात."


१९६४ साली जेननं ह्युगो वॅन लॉविक या डच छायाचित्रकाराशी विवाह केला. ह्युगो वन्य प्राण्यांचा उत्तम छायाचित्रकार होता. 'इन द शॅडो ऑफ मॅन' या ग्रंथातील चिम्पॅन्झी व जेनची छायाचित्रं ह्युगोने काढली आहेत.त्या ग्रंथाची समृद्धी वाढविण्यातत्याचंही श्रेय आहे.पुढे या उभयतांनी 'इनोसन्ट किलर्स' हा ग्रंथ लिहिला.त्यात रानकुत्री,कोल्हा आणि तरस या वन्य प्राण्यांची अप्रतिम छायाचित्रं आहेत.या दोघांचं गोम्बेमध्ये एकत्र येणं म्हणजे सुवर्णमणिकांचन योग होता.१९६७ साली गोम्बे येथे त्यांना मुलगा झाला. त्याचे नाव ग्रब.तो बालपणापासून जंगलातच वाढला.आता तो पूर्व आफ्रिकेत वन्यजीवांविषयी संशोधन करतो.या मुलाला तिनं जंगलात कसं वाढवलं याचा वृत्तांत तिनं 'ग्रब द बुशबेबी' या पुस्तकात दिला आहे.


जेन व ह्युगोचा विवाह अयशस्वी ठरला.नंतर १९७५ साली तिनं डेरेक ब्रायसेमन यांच्याशी पुनर्विवाह केला. ते टांझानिया राष्ट्रीय असेंब्लीचे सभासद आणि तेथील राष्ट्रीय उद्यानाचे संचालक होते.दुर्दैवाने १९८५ साली त्यांचं कॅन्सरनं निधन झालं.


आज तेथील स्थानिक अधिकारी तिला ममा ब्रायसेमन म्हणतात.दार-ए-सलाम येथील समुद्रकिनाऱ्यावर तिचं घर आहे.दर वर्षी तिथं काही काळ तिचं वास्तव्य असतं. त्यावेळी ती आपल्या रसिक चाहत्यांच्या पत्रांना उत्तरे देते आणि संशोधनाविषयी पुस्तकं व निबंध लिहून चिम्पॅन्झीविषयी जगाला अद्ययावत ज्ञान देते.वर्षांतील आठ महिने ती अमेरिका व युरोप देशांत दौरा करते. तेथील विद्यापीठ,प्राणिसंग्रहालये व प्राणिसंरक्षक संस्थांमध्ये व्याख्याने देऊन गोम्बे येथील सहायकांचा पगार तसेच प्रशिक्षणासाठी लागणारा पैसा गोळा करते. चिम्पॅन्झीमित्र असलेली जेन त्यांच्या संरक्षण व संवर्धनासाठी सातत्याने प्रयत्न करीत असते.फ्लो आणि दाढीवाला डेव्हिड तसंच त्यांचे वंशज आज संकटात आहेत.एकोणविसाव्या शतकाच्या अखेरीला त्यांची संख्या एक कोटी होती.आता जगातील चिम्पांझींची संख्या १ लाख ७५ हजार इतकी घसरली आहे.ती साऱ्या आफ्रिकेच्या जंगलातून पसरलेली आहे. झाडं तोडणाऱ्या कंपनी आणि शेतकरी त्यांचे निवासस्थान नष्ट करीत आहेत,तर काही भागात मांसाकरिता त्यांची हत्या केली जात आहे.


चिम्पांझींचे खरे वैरी अवैध शिकार करणारे आहेत.ते ह्या चिम्पांझींची पिलं पकडून सर्कस,कॅबेरेस्ट,प्राणी संग्रहालयात विकतात.जेन म्हणते, "पिलं धरण्याच्या मोहिमेत अथवा त्यांची वाहतूक करताना वीस पिलांपैकी एक पिलू जगतं." तिच्या प्रयत्नांमुळे जागतिक पातळीवर करारनामा होऊन त्यांना संरक्षण मिळविण्यात जेनला यश प्राप्त झालं आहे.परंतु तिला वाटतं,नुसते कायदे-कानून करून हे सारं काही थांबविता येणार नाही.तरी त्यामुळं बरेच नियंत्रण होईल.संशोधन प्रयोगशाळा आणि प्राणिसंग्रहालयातील चिम्पांझींचं राहणीमान उंचावं म्हणून जेन सातत्यानं काळजी वाहते.ती फार गाजावाजा किंवा आक्रोश करीत नाही.परंतु तिच्या शब्दाला मान आहे.


१९८९ साली जीव-औषधी शास्त्रज्ञांपुढे चिम्पॅन्झी आणि मानव यांच्यातील स्वभाव-साम्यांविषयी ती बोलली.तिच्या व्याख्यानानं अमेरिकेतील चिम्पांझींचे शास्त्रज्ञ गेझा टेलेकी प्रभावित होऊन म्हणाले, "पहिल्यांदा आम्हाला जाणीव झाली,की प्रयोगशाळेतील चिम्पॅन्झी उंदरापेक्षा निराळे आहेत." व्याख्यानाच्या शेवटी तेथील श्रोतृवर्ग टाळ्यांचा गजर करीत आनंदानं नाचला,तर कित्येक जणांच्या डोळ्यांत पाणी आलं.


वेळेअभावी आताशा जेन वर्षातून फक्त तीनदा गोम्बेला भेट देते.परंतु त्या भेटीचा तिला खूप आनंद होतो.ती म्हणते,

"चिम्पॅन्झर्झाबरोबर मला एकट्यानं राहणं आवडतं.त्यांच्या सहवासात साऱ्या विवंचनांचा मला विसर पडतो आणि मी मनानं प्रफुल्लित होऊन परतते."


गोम्बे येथील वास्तव्याचं तिसावं वर्ष साजरं करताना जेन म्हणाली,"ज्या चिम्पांझींना मी ओळखते,त्यांनी मला अति आनंद दिला व एक नवीन जीवनदृष्टी दिली. मला त्यांच्याविषयी कृतज्ञता वाटते.मी जगाला दाखवून दिलं,की ते कसे आगळेवेगळे प्राणी आहेत." अन् अशा प्राण्यांचे पुढील पिढीसाठी संरक्षण व जतन झाले पाहिजे. 


समाप्त…!!




२/३/२६

महामानव बापूजी / Great man Bapuji

अलौकिक कामगिरी


गांधीजींनी गेल्या अर्धशतकात भारतीय स्वातंत्र्यासाठी जशी अलौकिक कामगिरी बजावली त्याचप्रमाणे जागतिक शांततेच्या दृष्टीनेही महत्त्वाची कामगिरी पार पाडली.त्यांनी आम्हाला अहिंसेच्या तत्त्वज्ञानाची शिकवण दिली.पण दुष्ट प्रवृत्तीमुळे नमते घेणारे ते निष्क्रिय तत्त्वज्ञान नव्हते.

आंतरराष्ट्रीय मतभेदामध्येसुद्धा शांततेने निवाडा देणारे ते क्रियाशील तत्त्वज्ञान होते. जगातील कोणत्याही सामर्थ्यवान सैन्यापेक्षा, युद्धसाहित्यापेक्षा मानवाचे मानसिक सामर्थ्य मोठे असते हे त्यांनी आम्हाला दाखवून दिले.त्यांनी राजकीय चळवळीला नैतिक मूल्यांची जोड दिली व साध्य नि साधने भिन्न मानता येणार नाहीत;कारण शेवटी साधनांनीच साध्य नियंत्रित केले जाते असा त्यांनी आदेश दिला.


मनुष्यस्वभावाला असलेल्या मर्यादांकडे आपल्याला दुर्लक्ष करता येणार नाही त्याचप्रमाणे मुत्सद्द्यांपुढे ज्या समस्या आहेत त्यांकडेही आपण कानाडोळा करू शकत नाही.आज जगाची जी रचना आहे तिचा विचार करता जगात युद्धाचा मुळीच संभव नाही असेही आपण म्हणू शकत नाही;पण दिवसेंदिवस अशी खात्री होत चालली आहे की,नैतिक कायद्याचे श्रेष्ठत्व आपण मानले नाही तर आपल्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संबंधात कायमची शांतता नांदणार नाही.जोपर्यंत योग्य साधनांनी योग्य साध्ये निर्माण होणार नाहीत,

तोपर्यंत यातून नव्या अनिष्ट गोष्टी निर्माण होतील,गांधीजींच्या संदेशाचे हे मूल सूत्र होते.जीवनात योग्य रीतीने पाऊल टाकण्यासाठी मानवसमाजाने गांधीजींच्या संदेशाचा अर्थ समजावून घ्यायला हवा.


कोणत्याही प्रकारची भीती,भय न बाळगण्याचा त्यांनी आम्हाला आदेश दिला.भीतीची भावना अत्यंत नीच आहे इतकेच नव्हे तर भीतीच्या पोटी द्वेष व हिंसेचा जन्म होतो.आपल्या अनेक लोकांना या शिकवणीची विस्मृती पडली नि भीतीने आम्हाला ग्रासून टाकले.पण भीती लांबच्या शत्रूची नव्हती तर एकमेकांची आपल्याला भीती वाटत होती. त्यातूनच अनिष्ट कृत्यांचा प्रादुर्भाव झाला.


गांधीजींनी आम्हाला सत्यावर कसे प्रेम करावे व वैयक्तिक व्यवहारातच नव्हे तर सार्वजनिक राष्ट्राराष्ट्रांमधील व्यवहारातही सरळ धोरणाने कसे वागावे हेही शिकविले.त्यांनी आम्हाला माणसाच्या प्रतिष्ठेचे महत्त्व समजावून दिले,द्वेषातून नि हिंसेतून द्वेषाचा,हिंसेचा नि विध्वंसाचाच उदय होतो हे त्यांनी शिकविले.

त्यांनी आम्हाला निर्भयतेचा,ऐक्याचा, सहिष्णुतेचा नि शांततेचा मार्ग दाखविला.


भारताने आज जगात फार नाव मिळविलेले आहे.ही महानता मिळण्याची जी अनेक कारणे आहेत त्यांत गांधीजी हे एक मोठे कारण आहे.गांधीजींनीच हा मोठेपणा भारताला मिळवून दिला.

भारताच्या सैन्याने, आरमाराने अगर संपत्तीने प्राप्त झालेला हा मोठेपणा नाही.या थोर पुरुषाने जगातल्या नैतिक क्षेत्रातला व जगातल्या मुत्सद्द्यांमधला क्षुद्रपणा जगाच्या नजरेला आणला.

जगात भारताला हे असे मानाचे स्थान मिळाले याचे कारण नैतिक मूल्यांच्या दृष्टीने सारे जग भारताकडे पहाते हे आहे.


साम्राज्याशी सामना


काही बाबतीत आपण दुबळे असलो तरी आमच्या महान नेत्याकडून आम्हाला त्या दुबळ्या परिस्थितीतही शिकवण मिळाली.आमचे लोक निःशस्त्र असले, त्यांच्याकडे काही संपत्ती नसली अगर संपत्तीचे कोणतेही प्रतीक त्यांच्या हाती नसले तरी त्यांनी भारतातल्या अनेक वर्षे ठाण मारून बसलेल्या संपन्न साम्राज्याशी निकराचा सामना दिला.हा एक विलक्षण सामना होता.सुमारे पन्नास वर्षांपूर्वी गांधीजींनी भारतीय राजकारणाच्या क्षितिजावर पदार्पण केले त्या काळाकडे मी आज मागे वळून पाहात आहे.त्यांनी दक्षिण आफ्रिकेत केलेल्या कार्यामुळे त्यांना लोकप्रियता मिळालेली होती नि त्यांची सर्वत्र वाखाणणी होत होती हे खरे असले तरी भारतीय राजकारणाच्या पातळीवरून त्यांनी आपल्या राजकीय हालचालींना सुरुवात केली नव्हती.पण त्यांनी एकदम भारतीय राजकारणात पदार्पण करून जनतेला संदेश दिला.त्या संदेशात एक प्रकारची जादू होती.तसा तो संदेश अगदी साधा होता. त्यांनी भारतातील परिस्थितीचे विश्लेषण केले ते असे होते की,मुख्यतःसर्वसाधारण जनता नि अन्य लोक यांच्यातसुद्धा भीतीची भावना पसरलेली होती म्हणून गांधीजींनी आम्हाला बजावून सांगितले, "भिऊ नका, कसली भीती वाटते,तुम्हाला काय होणार आहे असे तुम्हाला वाटते?" ते अशा अनुरोधाने बोलत होते की, भारतीय जनतेला राजकीय परिस्थितीची भीती वाटत असावी.

आम्ही काही केले व ती गोष्ट ब्रिटिश सरकारला आवडली नाही तर आम्हाला शिक्षा होईल,आम्हाला तुरुंगात टाकले जाईल,

आमच्यावर गोळ्याही झाडल्या जातील,अशी भीती सर्वत्र पसरलेली होती.गरिबातल्या गरीब शेतकऱ्याला व खालच्या थरातील सर्व लोकांना ही भीती वाटणे साहजिकच होते.कारण गरीब शेतकऱ्याने कष्टाने पिकविलेले सारे धान्य जमीनदाराच्या घशात जात होते व धान्य पिकविणाऱ्या शेतकऱ्याला उपाशी राहावे लागत होते.जमीनदार, जमीनदाराचा कारभारी,पोलिस व सावकार या सर्वांच्या लाथा आणि बुक्के त्या बिचाऱ्या शेतकऱ्यालाच खावे लागत होते.वातावरणात फरक झाला होता की गांधीजींच्या आवाजातच काही जादू होती ते मला कळत नाही.पण गांधीजींनी ज्यावेळी 'भिऊ नका' या शब्दांची घोषणा केली त्यावेळी त्यांच्या शब्दांनी योग्य पकड घेतली.आमची अंतःकरणे एकदम उचंबळून आली व आमची खात्री पटली की,आता घाबरण्यासारखे काही राहिलेले नाही.गरीब शेतकऱ्यानेसुद्धा आपली वाकलेली पाठ ताठ केली नि तो निर्भयपणाने लोकांच्या नजरेला नजर भिडवू लागला.त्याच्या खोल गेलेल्या डोळ्यात आशेचे किरण दिसू लागले! याचा परिणाम म्हणजे साऱ्या देशात जादूची कांडी फिरल्याप्रमाणे सर्वत्र स्थित्यंतर घडून आले.अनेक उलथापालथीला आम्हाला तोंड द्यावे लागले. पण 'घाबरू नका' या गांधीजीच्या संदेशाने आम्हाला तारले व आता घाबरण्यासारखे काही नाही याची आम्हाला खात्री पटली.भीती म्हणजे काय ती आम्हीच मनात निर्माण केलेली होती.आम्ही लाखो लोक तुरुंगात गेलो.तुरुंगात जाणे हे काही तितके सुखाचे नव्हते.काही लोकांना त्रास झाला व दुःखही सहन करावे लागले.आपण ज्या दृष्टीने पहातो त्या दृष्टीवर सुखदुःखांच्या कल्पना अवलंबून असतात.

आम्ही कोणत्या तरी दुराचरणाने,दुष्कृत्याने कलंकित होऊन तुरुंगात गेलो असतो तर त्यामुळे आम्हाला अतिशय दुःख झाले असते.आम्ही जे केले त्यात घाबरण्यासारखे काही नाही;उलट अभिलाषा बाळगण्यासारखी ती गोष्ट आहे असे आम्हांला आत्मीयतेने वाटू लागले.


गांधीजींच्या स्फूर्तिदायक मार्गदर्शनाने भारतात जी शांततावादी क्रांती झाली,त्या क्रांतीचे नियम जगातील अनेक समस्या सोडविण्यासाठी लागू केले जाण्याची शक्यता आहे.भारतातील या क्रांतीने जगाच्या नजरेला अशी गोष्ट आलेली आहे की,शारीरिक बलाने काही माणसाच्या नशिबाचा निकाल लावता येत नाही. याबबतीत आपण ज्या पद्धतीने लढा देतो नि ज्या पद्धतीने त्याचा शेवट होतो तीच गोष्ट अत्यंत महत्त्वाची मानली जाते.


गांधीजींच्या शिकवणीनेच भारताच्या परराष्ट्रीय धोरणाची उद्दिष्टे आम्ही निश्चित केलेली आहेत.जगात शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करताना कोणत्याही शक्तिमान राष्ट्राशी अगर राष्ट्रगटाशी हातमिळवणी न करता स्वतंत्र धोरणाने प्रत्येक वादग्रस्त तेढीच्या प्रश्नाचा विचार करावयाचा.गुलामगिरीत खितपत घडलेल्या लोकांना मुक्त करायचे राष्ट्रीय नि वैयक्तिक स्वातंत्र्याचा पुरस्कार करायचा.वर्णभेदाचें उच्चाटन करायचे त्याचप्रमाणे जगातील बहुसंख्य जनतेला ग्रासणाऱ्या अज्ञानाचा,रोगराईचा नि उणिवांचा उच्छेद (समूळ नाश) करायचा! भारताने जे परराष्ट्रीय धोरण अंगीकारले आहे ते नकारात्मक नाही अगर तटस्थपणाचे नाही.ते निश्चित नि महत्त्वाचे धोरण आहे.


भारताची प्रगती घडवून आणण्यासाठीच केवळ शांततेच्या धोरणाची भारताला जरुरी आहे असे नसून त्या शांततेचे जागतिक दृष्ट्याही महत्त्व आहे.जगात युद्धाची जी भीती आहे ती कमी करणे व अखेरीलाही युद्धाची भीती माणसाच्या मनातून काढून टाकणे ही आमच्यापुढील समस्या आहे.पण साऱ्या जगाने युद्धाची भाषा बोलायला सुरुवात केली,राष्ट्रगटांनी एकमेकांची बाजू घेतली तर युद्धाची भीती कशी टाळता येईल


राष्ट्र या नात्याने आमचा दुबळेपणा अगर आमच्या उणिवा यांची आम्हाला जाणीव आहे.आमच्यात कोणता तरी सर्वश्रेष्ठ गुण आहे असाही आमचा दावा नाही.पण सध्या जागतिक राजकारणाबाबत आमचे जे स्वतंत्र, अलिप्ततेचे धोरण आहे त्या धोरणापासून मिळणारे फायदे गमावून बसण्याची आमची तयारी नाही,हे अलिप्ततेचे जागतिक संघर्षात सहभागी होण्याचे धोरण केवळ आम्हालाच उपकारक आहे असे नव्हे तर जागतिक शांतता नि स्वातंत्र्य यासाठीही उपकारक आहे.शांतता व स्वातंत्र्य यांच्यावर घाला पडण्याची वेळ आली,मानवी स्वातंत्र्यावर व शांततेवर संकट आले की भारत मूग मिळून स्वस्थ बसेल असे नाही.या परिस्थितीत भारताने तटस्थ धोरण स्वीकारले तर त्या उद्दिष्टांचा विश्वासघात केल्यासारखे होईल.म्हणूनच भारताचे आजचे अलिप्ततेचे धोरण म्हणजे संघर्षाकडे पाठ फिरवून दूर पळून जाण्याचे,बेफिकिरीचे अगर पूर्ण तटस्थेतेचे धोरण नाही.भारताच्या या अलिप्ततेच्या धोरणात जागतिक क्षेत्रात सहजीवन निर्माण करण्याचे तत्त्व सामावलेले आहे.शांततावादी सहजीवन म्हणजे कोणत्याही समस्येबाबत शांततेने वादविवाद करणे, इतरांचा दृष्टिकोन समजून घेणे,आपल्या मतांचा दुसऱ्यावर प्रभाव पाडण्याचा प्रयत्न करणे आणि कोणत्याही आंतरराष्ट्रीय प्रश्नात हस्तक्षेप करून उलथापालथ न करणे! आपण जी गोष्ट प्राणांपेक्षाही प्रिय मानतो तिचाच त्याग करणे अगर आमचा निर्णय इतर राष्ट्रांवर लादणे असा मात्र या धोरणाचा अर्थ नव्हे, अलिप्ततेचे धोरण हे एक मूलभूत उद्दिष्ट आहे,पण एखाद्या विशिष्ट परिस्थितीला अगर प्रसंगाला ते कसे लागू करायचे याबाबतीत निर्णय घेण्याचा आम्हाला अधिकार आहे.आमचे अलिप्ततेचे असे धोरण आहे. याचा अर्थ आपण एखादी गोष्ट मान्य करायची अगर करायची नाही असे नाही.जे उद्दिष्ट आपले ठरले आहे ते साध्य करण्यासाठी स्वतंत्र निर्णय घेण्याचे तत्त्व तटस्थतेच्या धोरणात सामावलेले आहे.


आपण ज्याला गांधी तत्त्वज्ञान अगर वैचारिक भूमिका म्हणतो त्या वैचारिक पातळीवर आपण पोहोचलो नाही. पण त्यांच्या तत्त्वज्ञानाचा आमचा आमच्या धोरणावर अजूनही प्रभाव आहे.आम्हाला शांतता हवी असेल तर त्या शांततेचे वातावरण आपण निर्माण करायला हवे. आपल्याविषयी ज्यांना संशय वाटतो त्यांना आपण जिंकण्याचा - प्रयत्न करायला हवा.आमची बाजू, आमची मनोभूमिका इतरांनी समजून घ्यावी अशी आपली अपेक्षा असते.त्याचप्रमाणे इतरांचीही भूमिका आपण समजून घ्यायला हवी.अनिष्ट गोष्टींचा अगर आक्रमणाचासुद्धा प्रतिकार करताना आपण शांततेची भूमिका पत्करायला हवी व जे केवळ भीतीने अगर अन्य कारणांनीही आपले शत्रुत्व पत्करण्यास तयार झाले आहेत त्यांच्यापुढे मैत्रीचा हात पुढे करायला हवा. ही शिकवण आम्हाला गांधीजींनी दिली.आमच्यातील अपूर्णत्वाची जाणीव असतानाही त्यांच्या महान शिकवणीपासून स्फूर्ती घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. आपले ध्येय उच्च असले तर आपण


उच्च तत्त्वांनाही चिकटून रहायला हवे.बुद्धकालापासून ते आजच्या गांधी-युगापर्यंत भारताची उच्च परंपरेची ही पार्श्वभूमी आहे.

आजच्या परिस्थितीत कोणत्याही सरकारला राज्यकारभार चालविताना अहिंसेच्या तत्त्वाचा पुरस्कार करता येणार नाही.

अहिंसेच्या तत्त्वाला आपण चिकटून राहिलो तर आपणास सैन्य,आरमार, वैमानिक दल इतकेच नव्हे तर पोलिस पथकेही ठेवता येणार नाहीत.आजच्या परिस्थितीच्या संदर्भात एखादे उच्च ध्येय लगेच अंमलात आणता येईल असे नाही.हे ध्येय साकार करण्यासाठी आपणास वाट पहावी लागेल.काश्मीरवर टोळीवाल्यांनी हल्ला केला त्यावेळी तेथे भारतीय सैन्य पाठविल्याच्या आमच्या धोरणांचे गांधीजीनी समर्थनच केले.

इतकेच नव्हे तर त्यांनी आम्हाला प्रोत्साहन देऊन आशीर्वाद दिला ! संपूर्णपणे अहिंसेच्या तत्त्वाला चिकटून राहणाऱ्या नि त्या तत्त्वाचा पूर्ण पुरस्कार करणाऱ्या गांधीजींनी आमच्या धोरणाला मान्यता दिली ही खरोखरच आश्चर्याची गोष्ट आहे. विशिष्ट परिस्थितीत सरकारला संरक्षणासाठी हिंसेचा वापर करण्याचा अधिकार पोहोचतो हे गांधीजींनी मान्य केले.भारत सरकार आजच्या परिस्थितीत आपला हा हक्क अबाधित राखील हे तितकेच खरे आहे. तथापि आम्ही आमची भूमिका अशी स्पष्ट केलेली होती. की, निव्वळ संरक्षणासाठीच सैन्याचा वापर करायचा, युद्धाला चिथावणी द्यायची नाही, अगर युद्ध सुरू करायचे नाही. अगर आक्रमक हालचाली सुरू करायच्या नाहीत. हेच आमचे मूलभूत धोरण होते !


गांधीजींची हुकूमशहाप्रमाणे भूमिका नव्हती.कुणाही माणसावर आपला निर्णय लादण्याची त्यांच्यात शक्ती होती.त्यांना इतरांवर निर्णय लादता आला असता.पण त्यांनी तसे केले नाही.त्यांनी जे काम करायचे ते प्रेमाने, सलोख्याने केले.आम्ही वारंवार त्यांच्याशी वादविवाद केला,त्यांशी भांडलोसुद्धा व त्यांना आमची विचारसरणी पटविण्याचा प्रयत्न केला.


गांधीजींमधला अलौकिक गुण म्हणजे इतरांतून चांगले गुण शोधून काढण्याचे त्यांचे कौशल्य ! एखाद्या माणसामध्ये अनेक दुर्गुण असले तरी नेमके त्याच्यातले गुण शोधून काढण्याची कला गांधीजींना चांगली साधलेली होती.त्यामुळे त्या बिचाऱ्या माणसाला त्याच्या इच्छेविरुद्धही चांगले वागावे लागत असे.


गांधीजी आपला निर्णय इतरांवर लादण्याचा प्रयत्न न करता इतरांची मने जिंकण्याचा प्रयत्न करीत असत.लोकांनी आपले विचार दाबून टाकावे आणि आंधळेपणाने त्यांचे अनुकरण करावे.असे गांधींना कधीच वाटले नाही.त्यांना असे अंधानुकरण नको होते.पण त्यांच्या व्यक्तिमत्त्वामुळे अपरिहार्यपणे लोकांना स्वतंत्रपणे आपली भूमिका मांडणे अनेक प्रसंगी कठीण जात असे.तरीही गांधीजींनी लोकांच्या या भूमिकेला कधी प्रोत्साहन दिले नाही.गांधीजींविषयी बोलणे मला आवडते याचे कारण त्यामुळे माझ्या मनाला समाधान वाटते व एका महानतेची जाणीव होते.त्या जाणिवेने मन वेगळ्या वातावरणात जाते.


आपल्या स्वतःभोवतीच्या संकुचित भूमिकेपासून आपण वेगळ्या प्रदेशाच्या वातावरणात पदार्पण करतो नि त्या वातावरणात आपणास जीवनातले क्षुद्र हेवेदावे,द्वेष, मत्सर दिसत नाहीत! गांधीजींचा विचार केल्याने मनाला एक प्रकारचे समाधान लाभत होते.पण आता आपण त्यांचे वारंवार नाव घेऊनही त्यांच्या तत्त्वाप्रमाणे आपले आचरण का होत नाही या विचाराने व शंकेने मन व्यथित होते.गांधीजींच्या सान्निध्यात येत असताना अंतःकरणात अशी कालवाकालव होते की आपण गांधीजींचे अनुयायी होण्यास लायक आहोत की नाही! आपण बोलतो एक व दाखवतो अगर कृती करतो दुसरी,असे तर आपल्या हातून होत नाही ना? ते हयात असताना जर अशी परिस्थिती तर ते आमच्या सान्निध्यात नसताना आमची भूमिका कशी राहील? तेव्हा गांधीजींची स्मृती नेहमीच आमच्यापुढे ही समस्या उभी करते !पण अशा प्रकारे निरर्थक प्रश्नचिन्हात आम्हाला फार वेळ गुरफटून राहाता येत नाही.चालू परिस्थितीच्या अनुरोधाने आमच्या कल्पनेप्रमाणे आम्हाला निर्णय घ्यायला हवा आहे.


गांधीजी हे निव्वळ उच्च तत्त्वे बाळगणारे व सत्याचे पुरस्कर्ते होते असे नव्हे तर त्यांना पूर्णपणाने जनमनाची नाडीही अवगत होती.भारतीय जनतेचा प्रतिनिधी म्हणून घेण्याचा कुणाला खरा हक्क असेल तर तो गांधीजींनाच ! गांधींजी भारतीय जनतेला ओळखत होते इतकेच नव्हे तर ते आम्हा कुणापेक्षाही जनतेच्या जीवनाचा एक भाग होऊन बसले होते गांधीजींनी जनतेला ज्या काही अलौकिक गोष्टी करायला सांगितल्या त्या लोकांनी त्यांच्या आदेशाप्रमाणे पार पाडल्याही;पण त्यांनी जनतेला कोणती अशक्य गोष्ट पार पाडण्यास सांगितली असेही नाही.एखाद्या व्यक्तीकडून गांधीजी कडक शिस्त पाळण्याची अपेक्षा करतील पण सर्वसाधारण जनतेकडून मात्र ते सक्तीच्या शिस्तीची अपेक्षा करणार नाहीत.तथापि त्यांनी अनिष्ट गोष्टींच्या बाबतीत कधी तडजोडीची भूमिका स्वीकारली नाही.या विशाल जगात केवढाही महान नेता असला तरी त्याला दैनंदिन कार्यात कधी तडजोडीची भूमिका स्वीकारावी लागतच नाही असे काही म्हणता येत नाही.


भावी इतिहासकार गतेतिहासाबद्दल लिहिताना आमच्या देशातील चालू परिस्थितीच्या अनुरोधाने काय लिहितील? ते इतिहासकार आमच्या महान नेत्याबद्दल असे लिहितील की,भारतात जन्म घेतलेल्या या नेत्याने हातात हातात हात घालून सहकार्याने कसे वागावे हे गुलामगिरीत खितपत पडलेल्या आपल्या देशबांधवांना शिकविले! एकाच देशात जन्मलेल्या व एकाच संस्कृतीच्या जनतेला विभागणाऱ्या ज्या कृत्रिम भिती होत्या त्या पार जमीनदोस्त करून आपल्यापेक्षा कमनशिबी असलेल्या हरिजनांना उच्च दर्जा देण्यास त्या नेत्याने आपल्या शिकवणीने भाग पाडले.ते इतिहासकार आणखी असेही लिहितील की, हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत पसरलेली भारतीय जनता असंख्य वर्षांच्या निद्रेतून जागी झाली व अभिमानाने मान उंचावून त्यांनी गांधीजींच्या नेतृत्वाखाली आपल्या देशाला स्वातंत्र्य प्राप्त करून घेतले व इतर देशांच्या स्वातंत्र्याचाही पुरस्कार केला. शेकडो वर्षांनंतर भारताने आपले तेज प्रगट केले. आपल्या प्राचीन संस्कृतीने तेजाळलेला आपला आवाज जगाला ऐकविला व त्या आवाजाचा साऱ्या जगावर परिणाम घडून आला! आम्ही भारतीयांनी आम्हांला अनेक शतकांपासून मिळालेला महान वारसा दूर फेकून दिला व धर्म,जात नि प्रांत यांचे भांडवल करून आम्ही एकमेकांमध्ये भांडत रहाण्याची नीच पातळी स्वीकारली तर सारे जग आपल्याला काय म्हणेल?


आपल्या जगात अनेक अनिष्ट गोष्टी आहेत अगर अनेक प्रकारचे द्रौर्बल्य आहे. पण मोठा दुबळेपणा म्हणजे भीती भीतीची भावना ! भीती हे अनेक अनिष्ट गोष्टींचे मूळ आहे.ज्या व्यक्तीला अगर राष्ट्राला भीतीने पछाडलेले आहे त्या व्यक्तीला,राष्ट्राला अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते व अभिमानाने मान उंचवण्यासही ते राष्ट्र समर्थ होऊ शकत नाही.पण गांधीजींच्या तत्त्वज्ञानापासून आम्हाला हे सामर्थ्य मिळाले.मनातील सारी भीती टाकून एकजुटीने निर्भयपणे शक्तिमान साम्राज्याशी सामना देण्याची शिकवण गांधीजीनी भारतीय जनतेस दिली! मग आता बंगालमध्ये अगर आसाममध्ये राहणाऱ्या आमच्या लोकांनी एकमेकांची भीती का बाळगावी? अशिक्षित लोक अगर छोट्या मनाचे लोकच एक भाषा दुसऱ्या भाषेविरुद्ध उलटविण्याचा नि भाषा भगिनींमध्ये भांडण लावायचा प्रयत्न करतात;पण शहाणे लोक मात्र भाषाभाषांमध्ये वितुष्ट न आणता मातृभाषेखेरीज अन्य भाषा शिकण्याचा प्रयत्न करतात!


आपल्या सभोवतालच्या जगापुढे आपण दृष्टी फेकूया. आंतरराष्ट्रीय परिस्थितीत अनुकूल पालट झाला आहे असे आपणास वाटते.आता मात्र परिस्थिती जास्त बिकट झाली आहे.लोकांनी एकमेकांविरुद्ध तलवारीचा खणखणाट करायला प्रारंभ केला आहे! अशा परिस्थितीत आम्ही किंचित प्रमाणात जरी आत्मसंतुष्ट वृत्ती दाखविली,ऐक्याचा अभाव व्यक्त केला तर आपण दुबळे ठरू,आपल्याला अपयश येईल! आपण आपली मने नि डोळे उघडे ठेवून वागायला हवे.ज्या थोर नेत्याने भारतीय जनतेत एवढी प्रचंड शक्ती निर्माण केली, त्यांच्यात एकजूट करून देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले त्या थोर नेत्याची आपण या प्रसंगी सतत स्मृती वागवायला हवी.आपल्या या थोर नेत्याच्या नावाचा पुनरुच्चार करणे अगर त्याची स्मृती बाळगणे यानेच केवळ भागणार नाही.त्याने आपल्याला जी अमोल शिकवण दिली आहे ती सदैव मनात बाळगून आपण त्या शिकवणीच्या अमृताने सारा देश संपन्न केला पाहिजे.आमच्या जीवनातला प्रकाश मावळला असून सर्वत्र काळोखाचे साम्राज्य पसरले आहे.आमचे परमप्रिय बापूजी,आमचे राष्ट्रपिता आम्हास सोडून गेले ! आमच्या जीवनातला प्रकाश मावळला असे मी एकदा उद्‌गार काढले तथापि माझे ते उद्‌गार चुकीचेही होते. कारण आपल्या देशात ज्या प्रकाशाचे तेज फुंकले गेले होते तो प्रकाश काही सामान्य प्रकारचा प्रकाश नव्हता! ज्या प्रकाशाने हा सारा देश दशदिशा उजळून टाकला तो प्रकाश आणखी असंख्य वर्षे या देशात प्रकाशत राहील! हजारो वर्षांनंतरही या प्रकाशाची तेजस्वी किरणे आपल्या देशात चकाकत राहतील.साऱ्या जगाला ती प्रकाशकिरणे पाहायला सापडतील व त्या प्रकाशकिरणांनी अनेकांच्या अंतःकरणाला समाधान लाभेल.कारण त्या प्रकाशात आजच्या घडीपेक्षा उद्याच्या घडीचे प्रतिबिंब जास्त प्रमाणाने एकवटलेले आहे.त्या प्रकाशात जिवंत शाश्वत सत्य सामावलेले आहे.तो प्रकाश आम्हाला योग्य मार्ग दाखवीत आहे, प्रमादापासून बाजूला सारून अनादी काळापासून अस्तित्वात असलेल्या या देशाला स्वातंत्र्याप्रत नेत आहे !


समाप्त…!