* विजय गायकवाड | Vijay Gaikawad

live

नमस्कार आपले स्वागत आहे. मी पुस्तके आणि मित्रांवर पैसे खर्च करतो,माझ्याकडे दगड आणि विटांवर खर्च करण्यासाठी पैसे नाहीत.- रस्किन बाँड.ही थोर माणसं व त्यांचे विचार मला पुस्तकात भेटलीत.ती भेटली आणि त्यांनी सांगितले कि, प्रत्येक दिवशी असं काही तरी करा की,ते तुम्हाला अधिक सुंदर उद्याच्या दिशेने खूप लांबवर घेऊन जाईल."- डोग फायरबाऊ.' सर्वियन कादंबरीकार मिलोराद पावीच यांचे एक वाक्य आहे ते म्हणतात - जोवर जगात पुस्तक वाचणाऱ्या वाचकांची संख्या बंदूकधारी सैनिका पेक्षा अधिक आहे तोवर काळजीच काहीच कारण नाही.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात.पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये.म्हणून अविरतपणे प्रयत्न करणारे मार्गदर्शक, मित्र धावून येतात.प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,डॉ.दीपक शेटे,आ.भरत बुटाले,प्रा.सर्जेराव राऊत,सुभाष ढगे,अनिल फारणे,डॉ.सुधीर सरवदे ,विश्वास खाडे, विनायक पाटील,संजय कुंभार,सतीश खाडे,मनोहर सुर्वे,गणेश खंदारे,तात्या गाडेकर, दादासाहेब गाडेकर, दादासाहेब ताजणे, पुस्तकातील घटना प्रसंग सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील यांनी केलेले आहे. मला लिहिण्याची प्रेरणा देणारी पुस्तके,लेखक,प्रकाशक,मित्र ही जगावेगळी माणसं माझ्या जीवनातील महत्वाचा टप्पा आहेत.... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ.मेघा गायकवाड, चिरंजीव मयान,माझ्या धावण्यातील गुरुवर्य नामदेव बरुरे,लुल्ला शेख मोठी ताई ,लहान ताई जयश्री शिंदे या सर्वांचेच मनापासून आभार व धन्यवाद मॅट्रिक फेल विजय गायकवाड

7/25/26

सर्पप्रेमाची झिंग / The zing of snake love

▶ जागतिक विक्रम प्रस्थापित करणं हा काही आमच्या प्रयोगामागचा हेतू नव्हता.साप हा उपद्रवी आणि भयप्रद प्राणी नसून तोही माणसाचा मित्रच आहे.त्याला त्रास दिला तरच तो चावतो,हे लोकांच्या मनावर ठसवणं हा आमचा उद्देश होता. सापांच्या बाबतीत लोकांवर अंधश्रद्धांचा सर्वाधिक पगडा होता.त्यामुळे दरवर्षी असंख्य साप विनाकारण मारले जात होते.या अंधश्रद्धा नष्ट करणं,सापांबद्दलची अतार्किक भीती कमी करणं हे आमचं काम होतं.अण्णाच्या विक्रमानंतर ते आम्ही अधिक जोमाने सुरू केलं.

शहराशहरांमध्ये जाऊन प्रत्यक्ष साप दाखवणं, विषारी-बिनविषारी सापांची माहिती देणं,ते ओळखायला शिकवणं,सापांबाबतचे गैरसमज दूर करणं आणि साप आढळला तर शक्यतो त्याला मारून न टाकता सर्पमित्रांना बोलावण्याची सवय लोकांना लावणं असं मोठंच आव्हानात्मक काम होतं हे.त्यासाठी गावोगावी सापांसोबतची प्रात्यक्षिकं करून दाखवायची आणि अनुभवाच्या आधारे लोकांच्या मनातली भीती काढायची असं आम्ही ठरवलं.अर्थातच त्यासाठी आर्थिक पाठबळाची आवश्यकता होती.आमच्याकडे एवढा पैसा कुठून यायला ! त्यामुळे सुरुवातीला आम्ही वेगवेगळ्या संस्थांची मदत घ्यायचं ठरवलं.लायन्स क्लब,रोटरी क्लब,जेसी क्लब अशा आंतरराष्ट्रीय संस्थांच्या आर्थिक मदतीने आम्ही सोलापूर,कोल्हापूर,सातारा,लातूर,

मुंबई,ठाणे आणि त्याबरोबरच राज्याबाहेर इंदौर, हैदराबाद अशा ठिकाणी सर्पप्रदर्शनं भरवली.

या सगळ्या ठिकाणी आम्ही जिवंत विषारी बिनविषारी साप घेऊन फिरायचो.त्यासाठी आवश्यक असणारा परवाना आम्ही रीतसर मिळवला होता.त्यासाठी आम्ही एक जुनी मेटॅडोरही भाड्याने मिळवली होती.त्यात सापांचे पिंजरे ठेवण्यासाठी जागा करून घेतली होती.ही गाडी होती अरुण नावाच्या एका कलंदर मराठी तरुणाची. नोकरीपेक्षा ट्रान्सपोर्टचा धंदा करून बघावा म्हणून बँकेचं कर्ज काढून त्याने ही मॅटॅडोर विकत घेतली होती.साप आणि पिंजरे घेऊन गावोगावी जाण्यासाठी पुण्यातल्या बऱ्याच वाहतूकदारांनी आम्हाला न परवडणाऱ्या भाड्याची मागणी केली होती.त्याच दरम्यान माझी अरुणशी ओळख झाली.तो स्वतःहून आनंदाने आमच्या कामात सहभागी झाला.अगदी कमी भाड्यात त्याने गाडी तर दिलीच,पण बहुतेकदा तो स्वतः ही आमच्यासोबत असायचा.मी,अण्णा,आमचा विश्वासू सहकारी दिनमहंमद पीरमहंमद शेख ऊर्फ दीनू मदारी आणि अरुण अशी आमची टीम होती. सापांचे पिंजरे,माहिती लिहिलेले फलक-पाट्या आणि बाकी काहीबाही सामान हा आमचा फिरता संसार.सापांचे पिंजरे,माहितीफलक आणि आमचा बाडबिस्तारा यामुळे मेटॅडोर गाडी भरून जात असे. पुढे गाडीत चालवणारा एक आणि त्याच्या शेजारी क्लीनरच्या जागी एक माणूस.त्यामुळे चौघांपैकी दोघांचीच सोय या मेटॅडोरमध्ये होत असे.त्यामुळे बहुतेक वेळा मी आणि अण्णा आमच्या बजाज सुपर स्कूटरवरून मेटॅडोरच्या पुढे-मागे राहत आलटून पालटून ड्रायव्हिंग करत मुक्कामास पोहचत असू.अगदी इंदौरपर्यंतही आम्ही अशीच मजल दरमजल करत प्रदर्शनं भरवली.रस्ता खराब असेल तर आणखीच फजिती व्हायची. खाचखळग्यांमधून गाडी धडधडून दोन-तीन पिंजऱ्यांच्या काचा हमखास फुटत असत.मुक्कामी गेल्यावर आमच्यासाठी तो पहिला भुर्दंड, म्हणजे वेलकम एक्सपेन्स असे. मुक्कामी पोहोचल्यानंतर दुसऱ्या दिवशी शहराचे महापौर किंवा आयोजक क्लबच्या अध्यक्षांच्या हस्ते वगैरे आमच्या सर्पप्रदर्शनाचं उद्घाटन होत असे.त्यानंतर पुढचे दोन-तीन दिवस प्रचंड गर्दी,व्याख्यानं,प्रात्यक्षिकं, शंकानिवारण यामध्ये निघून जात.दिवसभरात जेवायलाही वेळ मिळत नसे.प्रदर्शन गुंडाळून थकून भागून लांब पल्ल्याचा प्रवास करून आम्ही पुण्यात पोहोचत असू.या काळात आमच्या नोकऱ्या सुरू होत्याच.अण्णा 'हॉटेल ब्ल्यू डायमंड' मध्ये रिसेप्शनिस्ट आणि मी टेल्कोत.त्यामुळे तिथे रजा टाकून आम्हाला ही हौस भागवावी लागे.रजा मिळवण्यासाठीही बरीच खटपट करावी लागे. बऱ्याचदा खूप वर्षांपूर्वी स्वर्गवासी झालेल्या आमच्या आजी-आजोबांना पुन्हा जिवंत करून त्यांच्या आजारांची आणि निधनाची कारणं देऊन आम्ही सुटी मिळवत असू.सुरुवातीच्या दिवसांत अनेकदा बिनपगारी रजा काढूनही आम्ही हे दौरे केले.पण पुढे पुढे आम्ही रजा घेऊन काय उद्योग करतो हे लोकांना कळू लागल्यावर दोघांच्याही वरिष्ठांनी आम्हाला खूपच सहकार्य केलं.

या दौऱ्यांच्या काही आठवणी अविस्मरणीय आहेत. एकदा आम्ही प्रदर्शनासाठी नांदेडला निघालो होतो. मी आणि अण्णा स्कूटरवर होतो.बीडला पोहोचेपर्यंत चांगलंच अंधारून आलं;पण तरीही आम्ही गाड्या तशाच नांदेडच्या दिशेने दामटत राहिलो.आमची स्कूटर मेटॅडोरच्या खूप पुढे होती. अण्णा चालवत होता,मी मागे बसलो होतो. स्कूटरच्या हेडलाइटच्या प्रकाशात अण्णाला अचानक समोर काही तरी दिसलं म्हणून त्याने दोन्ही ब्रेक मारून गाडी थांबवली.रस्त्याच्या मधोमधच एखादा प्राणी बसल्यासारखं दिसत होतं. गाडीवरून उतरून हळूहळू दबकत दबकत पुढे गेलो.स्कूटरच्या प्रकाशात नेमकं काय आहे हे दिसत नव्हतं.तेवढ्यात मागून आलेल्या मेटॅडोरचा हेडलाइट पडला आणि कळलं,की कोणी प्राणीबिणी नसून ते पोह्याने भरलेलं पोतं होतं. त्यामुळे आकाराच्या मानाने जडही नव्हतं.काही न बोलता अरुण आणि दिनूने ते सरळ गाडीत टाकलं. नांदेड गाठून मुक्काम केला.सकाळी नेहमीप्रमाणे पिंजऱ्यांच्या फुटलेल्या काचा आणायला अरुण आणि दिनू बाजारात गेले आणि पोतंभर पोहे विकून आले.

त्या काळी आजच्यासारखे जीपीएस मॅप्स नसल्यामुळे रस्ता चुकणं,दोन गावांमधल्या अंतरांचा अंदाज चुकणं अशा गोष्टी हमखास घडत असत. असंच एकदा इंदौरचं प्रदर्शन संपवून त्याच रात्री माघारी फिरण्याच्या तयारीत होतो.प्रदर्शनाच्या संयोजकांवर खर्चाचा भार पडू नये म्हणून आम्ही शक्यतो प्रदर्शनाच्या शेवटच्या दिवशीच आमचा परतीचा प्रवास सुरू करत असू.नेहमीप्रमाणे सामानसुमान गाडीत भरून,खाणंपिणं उरकून आम्ही निघालो.खांडव्याला मेटॅडोर पंक्चर झाली. पंक्चर काढण्यात दोन-तीन तास गेले.अजून खूप अंतर कापायचं होतं.साप,पिंजरे,मेटॅडोर,स्कूटर आणि आम्ही सगळे एवढा सगळा लवाजमा घेऊन मध्येच कुठे तरी हॉटेलमध्ये मुक्काम करणंही शक्य नव्हतं आणि आम्हाला ते परवडणारंही नव्हतं. थकल्यामुळे अण्णा मेटॅडोरमध्ये बसला.दिनूला मागे घेऊन मी स्कूटर दामटली.सहा-सात तासांच्या प्रवासानंतर मध्यरात्री कधी तरी मध्य प्रदेशची हद्द ओलांडून आम्ही महाराष्ट्रात प्रवेश केला.मी आणि अण्णाने पुन्हा जागा बदलल्या.त्यानंतरचा रस्ता मात्र खूपच भयंकर होता.प्रचंड खाचखळगे.त्यात आम्ही सगळेच थकलो होतो.पेंग येत होती. ..आणि अचानक धाडकन आवाज होऊन आमची मेटॅडोर रस्ता सोडून डाव्या बाजूला घुसली.प्रसंगावधान राखून अरुणने तत्परतेने ब्रेक मारून गाडी

थांबवली. गाडी जवळपास डावीकडे कलंडण्याच्या बेतात होती.थांबून पाहिलं, तर या अपघातामुळे आतल्या पिंजऱ्यांच्या काचाही मोठ्या प्रमाणात फुटल्या होत्या,पण सुदैवाने कुणालाही लागलं नव्हतं.सापही व्यवस्थित होते. खाली उतरून पाहिलं,तर आमच्या गाडीचा अ‍ॅक्सल तुटला होता. आवाज ऐकून जवळचे गावकरी आले.तिथल्याच एका धाब्यावर चहा-बिस्किटं खाऊन रात्र काढली. दुसऱ्या दिवशी गाडी दुरुस्त करून पुणं गाठलं. सुखरूप पोहोचलो खरे,पण या सगळ्या गोंधळात आर्थिक फटका मोठाच बसला.पिंजऱ्यांच्या काचा तुटल्या,त्यात गाडीचाही खर्च उपटला.त्यामुळे पुढचे बरेच दिवस आम्हाला पुढचा दौरा काढता आला नाही.शिवाय असे दौरे किती दिवस काढत राहणार? त्यापेक्षा काही तरी वेगळं,अधिक समाधान देणारं काम करायला हवं असं आमच्या मनाने घेतलं.आणि त्याच दरम्यान आमचं आयुष्य हादरवून टाकणारी एक घटना घडली.

केवळ साप आणि वन्य जीवांच्या सेवेत झोकून द्यायचं,असं बऱ्याच दिवसांपासून अण्णाच्या डोक्यात घाटत होतं.त्यानुसार अखेर इंदौरच्या दौऱ्यानंतर काही दिवसांनी अण्णाने नोकरी सोडली.माझी टेल्कोची नोकरी मात्र सुरू होती. अण्णाने स्वतःला सापांना वाहून घेतलं.आमच्या बंगल्यातील सर्पकुंडाची व्यवस्था अण्णाच पाहत होता.शहरातील विविध भागांतून पकडून आणलेल्या सापांची देखभाल करणं,त्यांचं खाणंपिणं,कात काढणं,उन्हें दाखवणं आणि थोड्या दिवसांनी त्यांना सुरक्षित सोडून देणं अशी कामं तो मनापासून करत होता.बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी आणि ब्रिटिश कौन्सिलच्या ग्रंथालयात जाऊन साप आणि सरपटणाऱ्या सापांविषयी पुस्तकं मिळवून वाचून काढण्याचाही त्याने सपाटा लावला होता.पॉप्युलर बुक हाऊसच्या गाडगीळांमार्फतही त्याने इंग्लंड-अमेरिकेतून खूप पुस्तकं मागवली आणि वाचून काढली.सापांबरोबर वावरण्याचा अनुभव तर त्याला होताच,आता त्याचा अभ्यासही जोरात सुरू झाला.

(सोयरे वनचरे,अनिल खैर,समकालीन प्रकाशन)

- आणि नेमकी त्याच सुमारास अण्णाचंच नव्हे,तर माझंही आयुष्य बदलवून टाकणारी एक घटना घडली.२३ मे १९८२. रविवार होता.मी दुपारी ४ वाजता कामावरून घरी आलो. पायांतले बूट काढण्यापूर्वीच घरात काही तरी घडलंय असं जाणवलं.छोट्या बहिणीने रडवेल्या आवाजात अण्णाला घोणस चावल्याचं सांगितलं.आतल्या खोलीत आई रडत बसली होती.दादांनी रिक्षाने अण्णाला ससून हॉस्पिटलला नेलं होतं. बहिणीने आणलेला चहाचा कप तसाच ओट्यावर ठेवून मी स्कूटरने ससून गाठलं.एका बेडवर अण्णा झोपला होता. बाइट होऊन दोन-तीन तास तरी सहज झाले असावेत.त्याचा डावा हात खूपच सुजला होता. शिरेवाटे हळूहळू एएसव्हीचा डोस चालू होता. घोणसाच्या विषाचा गंभीर परिणाम झाला होता.ती रात्र आम्हा सर्वांसाठी खूप भयंकर होती.अण्णाला प्रचंड वेदना होत होत्या.झोप लागणं तर शक्यच नव्हतं.दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत दंश झालेला त्याचा डावा हात सुजून कमरेएवढा झाला होता. त्याच्या हाताला गँग्रीन झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.गॅग्रीन म्हणजे साक्षात यमदूतच ! परिणाम झालेल्या जागेवरून,उदाहरणार्थ,हाताच्या बोटांच्या पहिल्या पेरापासून सुरू झालेलं गँग्रीन क्षणाक्षणाला मुख्य शरीराच्या जवळ पोहोचतं. अशा वेळी रुग्णाचा प्राण वाचवण्याचा एकमेव उपाय म्हणून त्याचा गँग्रीन झालेला अवयव त्वरित कापून वेगळा करावा लागतो.त्याला अ‍ॅम्प्युटेशन' म्हणतात. अण्णाच्या हाताचा प्रवास तिकडेच चालला होता. दिवस उजाडूनही आमची काळरात्र संपली नव्हती.

अण्णाच्या हाताचा पंजा आणि पाचही बोटं काळी पडली होती.डॉक्टरांनी त्याच्या हातावर फॅशिओटॉमी करण्याचा निर्णय घेतला. फॅशिओटॉमी म्हणजे सुजलेल्या अवयवावर उभे आडवे छेद घेणं.या प्रक्रियेमुळे त्यामध्ये जमा झालेलं पाणी,पू,साकळलेलं रक्त वाहून जातं आणि त्यानंतर तो छेद पुन्हा शिवून टाकला जातो. 

'अ‍ॅम्प्युटेशनची वेळ येऊ नये म्हणून केला जाणारा हा उपाय.अण्णाच्या हाताची फॅशिओटॉमी झाली खरी;पण त्याचा उपयोग झाला नाही.दरम्यान, अण्णाच्या हाताचं गँग्रीन कोपराच्याही वर,पार दंडापर्यंत पसरू लागलं होतं.संपूर्ण हात जणू मृत झाला होता.अण्णाला तर काय चालू आहे हेही नीटसं कळत नव्हतं.तो संवेदनाहीन होऊन असहायपणे इकडे-तिकडे पाहत होता. एखाद-दुसरा शब्द उच्चारायचा,तोही असंबद्ध. आता तातडीने काही निर्णय घेणं भाग होतं.

त्या वेळी डॉ.सुभाष पत्की नावाचे निष्णात शल्यविशारद के.ई.एम.हॉस्पिटलच्या सर्जरी विभागाचे प्रमुख होते.ते आमच्या थोरल्या मेव्हण्यांचे मित्र.आम्ही तातडीने त्यांना भेटलो. त्यांच्या सूचनेनुसार आम्ही ससूनमधून डिस्चार्ज (अगेन्स्ट मेडिकल अ‍ॅडव्हाइस) घेतला आणि अण्णाला के.ई.एम.मध्ये आणलं.तिथे त्याला थेट ऑपरेशन थिएटरमध्येच नेण्यात आलं,आणि डॉ. पत्कींनी तातडीने त्याच्या हाताचं ग्युलेटिन

 अ‍ॅम्प्युटेशन केलं.मी,दादा,माझा मित्र विनोद पावशे,अण्णाची होणारी बायको नंदिता,आमची थोरली बहीण अक्का,तिचे पती दादासाहेब आणि आणखी काही मित्र के.ई.एम. मध्ये बसून होतो - छातीवर मणाचं ओझं घेऊन.तासाभराने तोंडावर मास्क लावलेले डॉ.पत्की ऑपरेशन थिएटरमधून बाहेर आले आणि त्यांनी मला विश्रामबागवाड्यामधून 'वैकुंठा'चा पास आणायला सांगितला.त्यांचा निरोप मला नीटसा कळला नाही. अण्णा गेला असं वाटून मी स्तब्ध झालो आणि मटकन जमिनीवर बसलो.माझ्या सोबत तेव्हा संजीव कडेकर हा मित्र होता.त्याने प्रसंगावधान राखून डॉ. पत्कींना स्पष्ट विचारलं,तेव्हा कळलं,की हा पास अण्णाच्या मुख्य शरीरापासून काढून टाकलेल्या हातासाठी हवा होता.अण्णा वाचला होता.सुटकेचा निःश्वास टाकत आम्ही पास काढायला गेलो आणि अण्णाच्या हाताला अग्नी देऊन आलो.जिवंत माणसाच्या मृत अवशेषाचं दहन करून आलो.एकीकडे अण्णा वाचला याचा आनंद आणि दुसरीकडे त्याचा हात गेला याचं दुःख याने आम्ही सारे हबकून गेलो.अण्णाला मात्र या सगळ्या उलथापालथीचा पत्ता नव्हता.तो वाचला खरा;पण आता कुठे त्याची खरी लढाई सुरू होणार होती.बेशुद्ध अवस्थेतील अण्णाला ऑपरेशन थिएटरमधून वॉर्डमध्ये आणलं.आता अण्णासोबत मी,विनोद आणि नंदिता होतो.नंदिताला काही तरी कारणं सांगून घरी पाठवण्याचा आम्ही खूप प्रयत्न केला;पण ती ठाम होती.जराही विश्रांती न घेता ती आमच्या बरोबरीने रात्रंदिवस अण्णाच्या सेवेमध्ये रुजू झाली.

ऑपरेशन आटोपून रात्री डॉ.पत्की के.ई.एम. हॉस्पिटलजवळ असलेल्या त्यांच्या घराकडे चालत निघाले होते.मीही त्यांच्यासोबत निघालो. माझ्याबरोबर नंदिताची आई,तारा वॉरियर होत्या. त्यांनी डॉक्टरांना स्पष्ट शब्दांतच विचारलं, "हा माणूस मरणार तर नाही ना?" डॉ.पत्की थोडेसे हसले आणि म्हणाले,"नाही. ही इज नाऊ आऊट ऑफ डेंजर.बट स्टिल,कीप युवर फिंगर्स क्रॉस्ड फॉर द नेक्स्ट फ्यू डेज...!" त्यामुळे पहिल्या तीन-चार दिवसांत आम्ही सगळ्यांनीच अण्णाची प्रचंड काळजी घेतली.हळूहळू त्याची प्रकृती सुधारू लागली आणि आम्ही अखेर कीप युवर फिंगर्स क्रॉस्डच्या मुदतीबाहेर पडलो.

अण्णाचा डावा हात कोपराच्या वर दंडातूनच काढून टाकला होता.दरम्यान,ऑपरेशननंतर बहुतेक वेळा अण्णा ग्लानीत असल्याने आपला हात कुठे आहे हे त्याला कळत नव्हतं.तो सतत त्याच्या डाव्या हाताचा शोध घेत असायचा.बऱ्याचदा विनोद स्वतःचा हात तिथे ठेवून 'हा काय तुझा हात' असं खोटंच सांगून अण्णाचं तात्पुरतं समाधान करायचा. शुद्ध आल्यावर त्याला सत्य समजणार होतंच.तसं ते समजलंच.त्याने ते कसं सहन केलं त्याचं त्यालाच माहीत ! तेव्हा त्याचं वय अवघं अठ्ठावीस होतं.

अण्णाच्या हाताच्या जखमेवर पुढे बरेच दिवस उपचार सुरू होते.डिस्चार्ज मिळाल्यानंतर सात-आठ महिन्यांनी जखम पूर्ण बरी झाली.त्या काळात माझा मित्र डॉ. सुहास बुलबुले दिवसाआड आमच्या घरी येऊन ड्रेसिंग करून देत असे.मी आणि विनोद सुहासला मदत करत असू.कधी कधी नंदिताही येत असे.ड्रेसिंगच्या वेळी साहजिकच अण्णाची काही ना काही कुरकुर व्हायची. साधी ठेच लागली तरी आपल्याला आई आठवते, अण्णाचा तर अख्खा हातच काढलेला होता. त्याला किती यातना होत असतील याची कल्पनाच केलेली

बरी.पण नंदिता सोबत असली की तो शांत राहत असे.पण अण्णा खरंच ग्रेट.त्याने हे सगळं मोठ्या धीराने आणि चिकाटीने सहन केलं. एवढी प्रचंड सहनशक्ती त्याच्यात कुठून आली, असा प्रश्न मला तेव्हा कायम पडायचा. जखम भरून आल्यावर वानवडी येथील मिलिटरीच्या कृत्रिम अवयव केंद्रामध्ये (आर्टिफिशियल लिंब सेंटर) त्याचं नाव नोंदवलं. आमच्यापुढे दोन पर्याय ठेवण्यात आले. एक तर संपूर्ण भारतीय बनावटीचा जयपूरमध्ये बनलेला कृत्रिम हात घ्यायचा,किंवा हाताचं मोजमाप थेट जर्मनीला पाठवून तिथूनच टेलरमेड हात बनवून घ्यायचा.पहिल्या प्रकारातील हाताचं वजन खूपच जास्त असतं.मात्र,जर्मनीमध्ये बनलेल्या हाताचं वजन साधारणपणे मानवी हाताएवढंच असल्याने आम्ही जर्मन हात मिळण्यासाठी अर्ज केला. तो मिळण्यासाठी बारा ते अठरा महिन्यांचा वेटिंग पीरियड होता.त्यामुळे त्या काळात अण्णाचं आयुष्य सुरळीत सुरू व्हावं यासाठी आम्ही सर्वांनी प्रयत्न चालवले. आठवड्यातून एकदोनदा मी आणि अण्णा रात्रीच्या सिनेमाला जाऊ लागलो.अण्णा लोकरीची शाल लपेटून रुबाबात माझ्या मागे बसून पिक्चरला येत असे. त्या वेळी आम्ही किती सिनेमे पाहिले त्याला गणतीच नाही. सिनेमे बघणं महत्त्वाचं नव्हतं. शेवटचा शो संपल्यावर थिएटरपासून घरी येतानाचा स्कूटरवरचा प्रवास आमच्यासाठी महत्त्वाचा होता. सिनेमा संपून थिएटरमधल्या सगळ्या गाड्या बाहेर पडल्या की मग आमची स्कूटर सुरू होत असे. फक्त माझ्याऐवजी पुढच्या सीटवर अण्णा बसत असे. मागच्या सीटवर बसून मी डाव्या हाताने स्कूटरचं डावीकडचं हँडल धरायचं आणि अण्णाच्या सूचनेनुसार क्लच दाबून गिअर बदलायचा,अशी कसरत करत आम्ही घरी यायचो.सुरुवातीला गोंधळ झाले;पण थोड्याच दिवसांत आमचं कोऑर्डिनेशन इतकं जबरदस्त जमून गेलं की आम्ही हळूहळू दिवसाही याच पद्धतीने स्कूटरवरून फेरफटका मारू लागलो. शाल गुंडाळून स्कूटर चालवणाऱ्या या माणसाला डावा हात नाहीये हे कुणाला कळतही नसे.अण्णाच्या मनात आत्मविश्वास निर्माण करणं हे आमचं मुख्य उद्दिष्ट होतं,आणि ते नक्कीच साध्य झालं.

त्याच सुमारास विनोदने टीव्हीएस फिफ्टी नावाची एक छोटी मोपेड टाइप टू व्हिलर विकत घेतली. अण्णाला ही गाडी खूपच आवडली.गाडी पाहून त्याच्या डोक्यात भलतीच आयडिया आली. एकदा त्या गाडीभोवती चक्कर मारून तो मला म्हणाला, "या गाडीच्या हँडलच्या उजव्या बाजूच्या लिव्हरला मागच्या ब्रेकची वायर जोड आणि डाव्या बाजूला पुढच्या ब्रेकची."

तो काय म्हणतोय हे कुणालाच कळलं नाही, फक्त माझी एकट्याचीच ट्यूब पेटली.त्याने सांगितल्यानुसार बदल केले आणि त्याला गाडी सुरू करून दिली.अण्णा ऐटीत शाल पांघरून पुढे बसला आणि मी मागे.आज मला काहीच काम नव्हतं.या गाडीला गियर नसल्यामुळे आणि मागच्या चाकाचा ब्रेक अण्णाच्या उजव्या हातात असल्यामुळे गाडी तोच चालवणार होता.आम्ही फिरायला बाहेर पडलो.मला वाटलं की आपण जवळच चक्कर मारून परत येऊ;पण अण्णाने गाडी थेट कात्रजच्या घाटातच नेली.समोरून येणाऱ्या बस,ट्रक वगैरे वाहनांना टाळून सुरक्षितपणे त्याने बोगदा पार केला.तिथून गाडी वळवून जवळपास दोन तासांनी आम्ही घरी पोहोचलो. अण्णा जिंकला होता! एका हाताने अतिशय आत्मविश्वासाने आणि सुरक्षितरीत्या गाडी चालवून तो परत आला होता. आता पुढे अण्णाचं त्या हातावाचून काही अडणार नाही याची मला त्यादिवशी खात्री पटली. मी निर्धास्त झालो.

अर्थात आमच्या अतिउत्साहामुळे कधी कधी घोटाळेही होत असत.एकदा असंच अण्णा स्कूटर चालवत होता आणि मी मागच्या सीटवर बसून त्याच्या सूचनेनुसार गियर बदलण्याचं काम करत होतो.घरी परतताना एका दुकानासमोर गाडी लावली आणि मी पटकन सामान आणायला रस्ता क्रॉस करून समोरच्या काका हलवाईच्या दुकानात गेलो.दुकानात पोचलो आणि मागे पाहिलं, तर स्कूटरसहित अण्णा डाव्या बाजूला पडलेला दिसला. मी पळतच त्याच्याकडे गेलो. गाडी उचलून स्टॅण्डवर लावली. मला कळेना, झोकात गाडी चालवणारा अण्णा स्कूटर थांबलेली असताना कसा काय पडला? अण्णाने सांगितल्यावर सगळा खुलासा झाला. डावा हात अजूनही जागेवरच आहे, असं फीलिंग अण्णाला अनेकदा व्हायचं. आणि नकळत तो प्रत्यक्षात अस्तित्वात नसलेल्या हाताचा वापर करायचा.आत्ताही तो पडला होता ते त्यामुळेच.हे साहजिकच होतं. एखाद्या माणसाने किंवा प्राण्यानेही हात किंवा पाय गमावल्यानंतर पुढचे कित्येक दिवस-महिने तो अवयव तिथेच असल्याचा भास त्याला होत राहतो. त्या प्रत्यक्षात नसलेल्या अवयवाकडून काम करून घेण्याचा प्रयत्नही केला जातो. त्यामुळे अपघात होऊ शकतात. अशा प्रत्यक्षात नसलेल्या अवयवाला 'फँटम लिंब' म्हणतात.म्हणजे आभासी अवयव. अण्णाच्या आभासी हाताने त्याला बऱ्याचदा चकवलं; पण वर्षभरात अण्णाने या सगळ्या समस्यांवर मात करून महत्प्रयासाने स्वतःचं सामान्य आयुष्य सुरू केलं. तोवर आर्टिफिशियल लिम्ब सेंटरकडून त्याला स्वतःचा असा हातही मिळाला आणि त्याच्या नव्या आयुष्याला सुरुवात झाली.

समाप्त—-------------!!!!!

"ज्ञानाचा प्रसार हा उद्देश आहे; मूळ लेखकांचा सन्मान ही जबाबदारी आहे." — विजय गायकवाड


.




7/23/26

एका न बसणाऱ्या पँटने मला माझ्याशी भेट घडवली. The Pair of Pants That Reintroduced Me to Myself.

एका निर्णयाची,एका संकल्पाचीआणि नव्या जन्माची सत्यकथा

लेखक : विजय गायकवाड


प्रत्येक माणसाच्या आयुष्यात एक क्षण येतो...

माणसाच्या आयुष्यात काही क्षण असे असतात की ते घडून जाताना अगदी साधे वाटतात. त्या क्षणी त्यांचं महत्त्व कळत नाही. त्यांच्यात ना कोणतं वादळ असतं, ना एखादा मोठा आवाज. पण काळ पुढे सरकतो, वर्षे उलटतात, आणि एक दिवस मागे वळून पाहताना जाणवतं—

"माझं आयुष्य त्या एका क्षणी बदललं होतं."

इतिहास अशाच क्षणांनी भरलेला आहे.

झाडावरून पडणारं सफरचंद अनेकांनी पाहिलं; पण न्यूटनने त्यात गुरुत्वाकर्षणाचा प्रश्न पाहिला.

चहाच्या किटलीतून निघणारी वाफ असंख्य लोकांनी पाहिली; पण जेम्स वॉटने त्या वाफेत भविष्याचा शोध पाहिला.

घटना त्या त्या असतात.

बदलणारी गोष्ट असते—

ती पाहण्याची दृष्टी.

जी नजर प्रश्न विचारते...

तीच आयुष्य बदलते.

माझ्याही आयुष्यात असा एक क्षण आला.

तो कोणत्याही विद्यापीठात घडला नाही.

तो प्रयोगशाळेत घडला नाही.

तो माझ्याच घरात...

माझ्याच कपाटासमोर घडला.

आणि त्या दिवशी मला कोणत्याही आरशाने नव्हे...

एका न बसणाऱ्या पँटने माझं खरं रूप दाखवलं.


दहा मिनिटांचा फोन... आणि आयुष्यभराचा निर्णय

त्या दिवसाची तारीख मला आठवत नाही.

पण तो दिवस मी आयुष्यभर विसरणार नाही.

नेहमीप्रमाणे दिवस सुरू झाला होता.

फौंड्रीतील काम...

घर...

जबाबदाऱ्या...

सगळं नेहमीसारखंच.

तेवढ्यात मोबाईल वाजला.

स्क्रीनवर नाव झळकलं—

"डॉ. दीपक शेटे."

मी फोन उचलला.

नेहमीच्या उत्साही आवाजात ते म्हणाले,

"विजय, दहा मिनिटांत येतोय. आवर. बाहेर जायचं आहे."

"ठीक आहे," एवढंच उत्तर देऊन मी फोन ठेवला.

दहा मिनिटं...

ऐकायला खूप वाटतात.

पण तयार व्हायचं असेल तर ती क्षणात संपून जातात.

मी घाईघाईने कपाट उघडलं.

पहिली पँट बाहेर काढली.

घालायला सुरुवात केली.

कमरेपर्यंत आली...

पण पुढे सरकलीच नाही.

मी स्वतःलाच म्हणालो,

"बहुतेक धुवून आकसली असावी."

दुसरी पँट काढली.

तीही तशीच.

तिसरी...

चौथी...

पाचवी...

एकामागून एक.

आता मात्र माझ्या कपाळावर घाम आला होता.

घाईमुळे नव्हे...

तर सत्यामुळे.

त्या क्षणी माझ्या लक्षात आलं—

कपडे कधीच खोटं बोलत नाहीत.

आरसा रोज पाहिल्यामुळे बदल लपवतो.

पण कपडे...

ते प्रत्येक वाढलेला इंच लक्षात ठेवतात.

आणि त्या दिवशी त्यांनी माझ्याकडे पाहून जणू शांतपणे सांगितलं—

"विजय... आता स्वतःकडे पाहण्याची वेळ आली आहे."

क्षणभर मी निःशब्द उभा राहिलो.

त्या कपाटासमोर उभा असलेला माणूस मीच होतो.

पण त्या क्षणी मला स्वतःचाच अपरिचित वाटू लागलो.

आपण आयुष्यात किती सहज स्वतःकडे दुर्लक्ष करतो!

जबाबदाऱ्या वाढतात.

काम वाढतं.

वेळ कमी पडतो.

आणि त्या सगळ्यात...

आपण स्वतःलाच मागे सोडून देतो.

माझ्याबाबतीतही तसंच झालं होतं.

वजन एका दिवसात वाढलं नव्हतं.

ते रोज थोडंसं वाढत गेलं.

इतकं थोडंसं...

की ते मला कधी जाणवलंच नाही.

पण त्या दिवशी...

त्या न बसणाऱ्या पँटने मला एका क्षणात अनेक वर्षांचं सत्य दाखवलं.


एक स्पोर्ट्स पँट... आणि नव्या आयुष्याची चाहूल

शेवटी कपाट बंद केलं.

कामावर वापरण्यासाठी आणलेली एक साधी स्पोर्ट्स पँट होती.

ती घातली.

आरशात स्वतःकडे पाहिलं.

मी तयार होतो.

पण मन अजूनही अस्वस्थ होतं.

थोड्याच वेळात डॉ. दीपक शेटे आले.

आम्ही बाहेर पडलो.

रस्त्यावरची गर्दी नेहमीसारखीच होती.

लोक त्यांच्या कामात व्यस्त होते.

जगासाठी तो दिवस इतर दिवसांसारखाच होता.

पण माझ्यासाठी...

तो माझ्या आयुष्याचा वळणबिंदू ठरत होता.

त्या दिवशी मी डॉ. दीपक शेटे यांच्यासोबत फिरत होतो.

पण माझ्या मनात मात्र एकच प्रश्न घुमत होता—

"मी इतका बदललो कधी?"

त्या प्रश्नाचं उत्तर त्या दिवशी मिळालं नाही.

पण त्या प्रश्नाने माझ्या मनात एक शांत अस्वस्थता निर्माण केली.

काही प्रश्नांची उत्तरं पुस्तकांत मिळत नाहीत.

ती आरशातही मिळत नाहीत.

ती मिळतात...

स्वतःशी प्रामाणिक झाल्यावर.

त्या रात्री मी उशिरापर्यंत जागाच होतो.

घरात सगळे झोपले होते.

बाहेर शांतता होती.

पण माझ्या मनात विचारांचं वादळ उठलं होतं.

एकच प्रश्न पुन्हा पुन्हा समोर येत होता—

"जर मी आज स्वतःला बदललो नाही... तर पाच वर्षांनी मी कुठे असेन?"

त्या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे नव्हतं.

पण त्या प्रश्नाने मला एक गोष्ट शिकवली.

जी रात्र आपल्याला झोपू देत नाही...

तीच आयुष्याला जागं करते.

भाग १-ब : निर्णय... ज्याने माझा दुसरा जन्म घडवला

"...जी रात्र आपल्याला झोपू देत नाही, तीच आयुष्याला जागं करते."

त्या रात्रीनंतर मी पूर्वीसारखा राहिलो नाही.

बाहेरून सगळं तसंच होतं.

सकाळी उठणं...

फौंड्रीत कामावर जाणं...

संध्याकाळी घरी परतणं...

जीवन नेहमीच्या लयीत चालू होतं.

पण माझ्या मनात एक शांत संघर्ष सुरू झाला होता.

तो संघर्ष शरीराशी नव्हता.

तो कोणाशीही नव्हता.

तो माझ्या जुन्या सवयींशी होता.

दररोज मनात एकच प्रश्न उमटत होता—

"तुला खरंच बदलायचं आहे... की बदलाबद्दल फक्त बोलायचं आहे?"

त्या प्रश्नापासून पळून जाणं आता शक्य नव्हतं.

कारण सत्य एकदा दिसलं की ते पुन्हा कधीच अदृश्य होत नाही.


३ फेब्रुवारी — माझ्या नव्या आयुष्याची पहिली सकाळ

प्रत्येकाच्या आयुष्यात एक तारीख अशी असते...

जी कॅलेंडरवर फक्त एक दिवस असते.

पण मनात ती एका नव्या जन्माची नोंद बनून राहते.

३ फेब्रुवारी.

ही तारीख माझ्यासाठी तशीच आहे.

त्या दिवशी मी कोणालाही काही सांगितलं नाही.

कोणताही गाजावाजा केला नाही.

कोणतीही घोषणा केली नाही.

कारण मला समजलं होतं—

घोषणांना टाळ्या मिळतात...

पण निर्णय आयुष्य बदलतात.

त्या दिवशी मी स्वतःशी एक निःशब्द करार केला.

"आजपासून चोवीस तासांत फक्त एकदाच जेवायचं."

ना शपथ...

ना दिखाऊपणा...

ना कोणाला दिलेलं वचन...

फक्त स्वतःला दिलेला शब्द.

आणि त्या दिवसापासून माझ्या नव्या आयुष्याची सुरुवात झाली.


भूक... की सवय?

पहिलाच दिवस सोपा नव्हता.

भूक लागली.

खूप लागली.

पण काही वेळाने मला जाणवलं...

माझ्या शरीराला जितकी भूक लागली होती, त्यापेक्षा जास्त भूक माझ्या सवयींना लागली होती.

घड्याळ ठरलेल्या वेळेला पुढे सरकत होतं.

आणि मन म्हणत होतं—

"आता काहीतरी खायची वेळ झाली."

मी स्वतःलाच विचारलं—

"मला खरंच भूक लागली आहे...

की ही फक्त सवय बोलते आहे?"

त्या एका प्रश्नाने माझा विचार बदलला.

मला समजलं—

आपण अनेकदा पोटासाठी खात नाही.

आपण वेळेसाठी खातो.

सवयीसाठी खातो.

समोर अन्न आहे म्हणून खातो.

आणि नकळत...

आपण स्वतःच्या शरीराचं ऐकणंच विसरून जातो.

त्या दिवसापासून मी एक नवी सवय लावली.

अन्नापूर्वी...

मी स्वतःला ऐकायला लागलो.


पहिला विजय

पहिला दिवस गेला.

दुसरा दिवस गेला.

मग एक आठवडा.

नंतर एक महिना.

प्रत्येक दिवसानंतर मला जाणवत होतं—

भूक कायम राहत नाही.

पण स्वतःला दिलेला शब्द मोडला...

तर त्याची खंत मात्र खूप काळ मनात राहते.

म्हणून प्रत्येक दिवशी मी स्वतःला एकच गोष्ट आठवण करून द्यायचो—

"आजचा दिवस पूर्ण कर."

उद्याचा विचार उद्या करू.

आणि अशा प्रकारे...

एक दिवस दुसऱ्या दिवसाला जोडत गेला.

निर्णय सवय बनत गेला.

आणि सवय...

माझं नवं आयुष्य घडवत गेली.


मी वजन कमी करत नव्हतो...

एक दिवस कामावरून घरी परतताना अचानक मनात विचार आला—

"मी नेमकं काय करतो आहे?"

उत्तर लगेच मिळालं.

मी वजन कमी करत नव्हतो.

मी माझ्या इच्छांवर नियंत्रण ठेवायला शिकत होतो.

मी माझ्या मनाला "नाही" म्हणायला शिकत होतो.

मला तेव्हा समजलं—

जगातली सर्वात कठीण लढाई दुसऱ्याशी नसते...

ती स्वतःशी असते.

आणि जो माणूस स्वतःवर विजय मिळवतो...

त्याच्यासाठी इतर प्रत्येक विजय छोटा ठरतो.


बदलाची बीजं

त्या दिवसांत वजनकाट्यावरचे आकडे हळूहळू बदलत होते.

पण माझं लक्ष आकड्यांकडे नव्हतं.

माझं लक्ष एका गोष्टीवर होतं—

मी आजही स्वतःला दिलेला शब्द पाळला का?

कारण आता मला खात्री झाली होती...

वजन कमी होणं हा परिणाम आहे.

कारण नाही.

कारण आहे—

निर्णय.

शिस्त.

आणि सातत्य.

त्या तीन गोष्टींनी माझ्या आयुष्यात बदलाची बीजं पेरली होती.

मला अजून माहिती नव्हतं...

की काही महिन्यांनंतर त्या बीजांचं रूपांतर अशा प्रवासात होईल...

ज्यामुळे माझं शरीरच नव्हे...

तर माझं संपूर्ण आयुष्य बदलून जाईल.

 घाम, पुस्तकं आणि स्वतःला घडवण्याचा प्रवास

निर्णय घेतला होता.

आता त्याची परीक्षा सुरू झाली होती.

जीवनात काही निर्णय असे असतात की त्यांचं यश पहिल्या दिवशी दिसत नाही. ते रोज थोडंसं घडत असतं. प्रत्येक दिवस त्या निर्णयावर शिक्कामोर्तब करत असतो.

माझ्याबाबतीतही तसंच होत होतं.

प्रत्येक सकाळ नव्या निर्धाराने सुरू व्हायची.

प्रत्येक संध्याकाळ स्वतःला दिलेला शब्द पाळल्याचं समाधान देऊन संपायची.

हळूहळू मला जाणवू लागलं—

शरीर बदलण्यापूर्वी विचार बदलतात.

आणि विचार बदलले की आयुष्य आपोआप बदलायला सुरुवात करतं.


घामाशी माझं नातं

मी वातानुकूलित कार्यालयात काम करणारा माणूस नाही.

मी फौंड्रीमध्ये काम करतो.

भट्टीसमोर थेट काम करत नसलो, तरी त्या उष्णतेच्या वातावरणात दिवसाचे अनेक तास श्रम करतो. लोखंडाचा वास, यंत्रांचा आवाज, धूळ, घाम आणि सतत चालणारी हालचाल—हीच माझी कार्यशाळा आहे.

या कामाने मला एक मोठा धडा दिला आहे—

घामाला पर्याय नसतो.

शरीराने केलेल्या प्रामाणिक श्रमाची जागा कोणतीही गोष्ट घेऊ शकत नाही.

संध्याकाळी घरी परतताना अंग थकलं असे.

हात थकलेले असत.

पाय दिवसभराच्या उभ्या कामामुळे जड झालेले असत.

पण त्या श्रमांतही एक समाधान असायचं.

कारण श्रम करणारा माणूस रात्री शांत झोपू शकतो.


पुस्तकांनी मला थंडावा दिला

काम संपलं की शरीर थकलेलं असायचं.

काही जण थकवा विसरण्यासाठी वेगवेगळे मार्ग निवडतात.

मी मात्र पुस्तकांकडे वळायचो.

पुस्तकं माझ्यासाठी केवळ अक्षरांचा संग्रह नव्हती.

ती दिवसाच्या कष्टांनंतर मनाला मिळणारा गारवा होती.

फौंड्रीतील श्रमांनी शरीराला घाम दिला...

तर पुस्तकांनी मनाला थंडावा दिला.

मी अनेकदा अनुभवला आहे—

दिवसभराचा थकवा एका चांगल्या पुस्तकाच्या काही पानांत विरघळून जातो.

त्या शांत क्षणांत मी स्वतःशी पुन्हा भेटायचो.

म्हणूनच आजही मी ठामपणे म्हणतो—

शरीराला अन्न जितकं आवश्यक आहे, तितकीच मनाला पुस्तकांची सोबत आवश्यक आहे.

भाकरी माणसाला जगवते.

पण विचार...

माणसाला कसं जगायचं ते शिकवतात.


वजनकाटा खोटं बोलत नाही

काही आठवड्यांनी सहज वजन केलं.

काटा थोडा खाली आला होता.

क्षणभर आनंद झाला.

पण लगेच मी स्वतःला थांबवलं.

"विजय, वजनावर प्रेम करू नकोस.

निर्णयावर प्रेम कर."

त्या दिवसापासून वजनकाटा माझं ध्येय राहिला नाही.

तो फक्त प्रवासाचा साक्षीदार राहिला.

माझं खरं ध्येय होतं—

दररोज स्वतःला दिलेला शब्द पाळणं.

कारण मला उमगलं होतं—

शिस्त ही प्रेरणेपेक्षा मोठी असते.

प्रेरणा काही दिवस टिकते.

शिस्त आयुष्यभर साथ देते.


बदल लोकांना दिसू लागला

महिने सरकत होते.

वजन कमी होत होतं.

पण त्याहून मोठा बदल माझ्या चेहऱ्यावर दिसत होता.

चालण्यात हलकेपणा आला होता.

श्वास मोकळा झाला होता.

कामात चैतन्य वाढलं होतं.

लोक भेटले की विचारू लागले—

"काय रे विजय, आजारी होतास का?"

मी हसायचो.

कारण त्यांच्या नजरेत वजन कमी होणं म्हणजे आजार.

आणि माझ्या नजरेत...

ते नव्या आयुष्याचं स्वागत होतं.

मी त्यांना एवढंच सांगायचो—

"नाही... आजारी नव्हतो.

उलट अनेक वर्षांनी स्वतःची काळजी घ्यायला शिकलो."

तेव्हा मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली—

जगाला तुमच्यातला बदल दिसतो.

पण त्या बदलामागचा संघर्ष फक्त तुम्हालाच माहीत असतो.


एक हसरा संवाद

एक दिवस घरी सहज उभा होतो.

माझ्याकडे पाहत माझी पत्नी, सौ. मेघा, हसून म्हणाली—

"आता बस... फार वजन कमी करू नका. मला फक्त हाडांच्या सापळ्याबरोबर संसार करायचा नाही."

आम्ही दोघंही हसलो.

पण त्या वाक्यात खूप काही होतं.

काळजी होती.

प्रेम होतं.

आणि माझ्या बदलाचा स्वीकारही होता.

त्या क्षणी मला जाणवलं—

आपण स्वतःसाठी बदलतो.

पण त्या बदलाचा सर्वात मोठा आनंद...

आपल्या माणसांच्या डोळ्यांत दिसतो.


मी स्वतःला घडवत होतो

एका दिवशी आरशात स्वतःकडे पाहिलं.

चेहरा बदलला होता.

शरीर बदलत होतं.

पण मला सर्वात जास्त आनंद कशाचा झाला माहिती आहे?

मी आता स्वतःला दिलेला शब्द सहज पाळत होतो.

मी वजन कमी करत नव्हतो.

मी स्वतःला घडवत होतो.

माझी लढाई किलोशी नव्हती.

ती सबबींशी होती.

आळशीपणाशी होती.

"उद्यापासून" या शब्दाशी होती.

आणि प्रत्येक दिवसानंतर मला जाणवत होतं—

मी त्या लढाईत जिंकत चाललो होतो.

कारण आता माझा प्रतिस्पर्धी दुसरा कोणी नव्हता.

तो कालचा "मी" होता.

आणि आजचा "मी"...

कालच्या माझ्यापेक्षा नक्कीच अधिक मजबूत झाला होता.

 स्वतःला सापडण्याचा प्रवास

दिवस सरकत होते.

मी दिवस मोजत नव्हतो.

मी स्वतःला घडवत होतो.

एक दिवस सहज कपाट उघडलं.

समोर त्या पँट होत्या...

ज्या काही महिन्यांपूर्वी मला नाकारून गेल्या होत्या.

मी त्यांपैकी एक पँट बाहेर काढली.

शांतपणे घातली.

ती सहज कमरेपर्यंत आली.

मी बेल्ट लावला.

आणि...

बेल्टचं आणखी एक भोक आत घालावं लागलं.

क्षणभर माझी नजर आरशावर स्थिरावली.

आरशात दिसणारा माणूस तोच होता.

पण त्याच्या डोळ्यांत एक वेगळीच शांतता होती.

त्या दिवशी मला समजलं—

पँट बदलली नव्हती.

बदललो होतो मी.

कधीकाळी न बसणाऱ्या त्या पँट...

आज बेल्ट लावूनही सैल झाल्या होत्या.

त्या क्षणी मला विजयाचा अभिमान वाटला नाही.

मनात एकच भावना होती—

स्वतःला दिलेला शब्द पाळल्याचा आनंद.


लोकांना दिसला बदल... मला दिसला प्रवास

वजन १०४ किलोवरून ७९ किलोवर आलं.

लोकांनी विचारायला सुरुवात केली—

"काय केलंस?"

काहींना एखाद्या औषधाचं नाव हवं होतं.

काहींना एखाद्या जादुई उपायाचं.

मी मात्र प्रत्येक वेळी हसायचो.

कारण माझ्याकडे कोणतंही गुपित नव्हतं.

मी फक्त...

एक निर्णय घेतला.

आणि त्या निर्णयाशी प्रामाणिक राहिलो.

आज मागे वळून पाहताना मला वाटतं—

मी पंचवीस किलो वजन कमी केलं नाही.

मी पंचवीस किलो सबबी कमी केल्या.

पंचवीस किलो निष्काळजीपणा कमी केला.

पंचवीस किलो "उद्यापासून" हा शब्द कमी केला.


जेम्स वॉट... आणि माझी पँट

इतिहास सांगतो—

चहाच्या किटलीतून निघालेल्या वाफेने जेम्स वॉट यांच्या मनात एक प्रश्न निर्माण केला.

त्या प्रश्नातून एक नवं युग जन्माला आलं.

माझ्याकडे प्रयोगशाळा नव्हती.

मोठे शोध नव्हते.

माझ्याकडे होती...

एक न बसणारी पँट.

जगासाठी ती फक्त एक पँट होती.

माझ्यासाठी...

ती माझ्या आयुष्याची गुरु ठरली.

तिने मला विचारलं—

"तू असाच जगणार आहेस... की स्वतःला बदलणार आहेस?"

मी त्या प्रश्नाचं उत्तर शब्दांनी दिलं नाही.

मी ते माझ्या आयुष्याने दिलं.


माझ्या प्रवासामागचं खरं कारण

आता या लेखातील सर्वात महत्त्वाची गोष्ट सांगतो.

अनेकांना वाटेल...

मी हा प्रवास फक्त वजन कमी करण्यासाठी केला.

पण ते पूर्ण सत्य नाही.

या प्रवासामागे एक छोटासा हात आहे.

माझ्या मुलाचा.

मयान.

एकोणीस वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आमच्या आयुष्यात तो आला.

अनेकांनी आशा सोडायला सांगितली.

काहींनी वैद्यकीय पर्याय सुचवले.

पण एका संवेदनशील डॉक्टरांच्या उपचारांनी आणि नियतीच्या कृपेने आम्हाला नैसर्गिकरित्या पुत्ररत्न प्राप्त झालं.

त्या दिवशी मला फक्त मुलगा मिळाला नाही...

मला नव्याने जगण्याचं कारण मिळालं.

त्याचं नाव आम्ही ठेवलं—

"मयान."

या नावाचा माझ्यासाठी अर्थ केवळ एक नाव नाही.

तो एक विचार आहे.

एक प्रवास आहे.

माझ्यासाठी...

मयान म्हणजे स्वतःला शोधणं.

मयान म्हणजे स्वतःला सापडणं.

मयान म्हणजे शाश्वत सत्याचा शोध.

मयान म्हणजे आयुष्य बदलण्याची तयारी.

माझ्या मुलाच्या जन्माने मला एक प्रश्न विचारला—

"तू त्याच्यासाठी किती काळ निरोगी, सक्षम आणि जागरूक राहणार?"

याच प्रश्नाने माझ्या निर्णयाला बळ दिलं.

आज मला वाटतं—

एका न बसणाऱ्या पँटने मला जागं केलं...

पण मयानने त्या जागृतीला अर्थ दिला.


शेवट... जो प्रत्येकाच्या आयुष्यात यायलाच हवा

आज माझं वजन ७९ किलो आहे.

पण हा लेख वजनाबद्दल नाही.

तो निर्णयाबद्दल आहे.

तो आत्मविश्वासाबद्दल आहे.

तो स्वतःला दिलेला शब्द जपण्याबद्दल आहे.

आजही मी फौंड्रीत काम करतो.

आजही घाम गाळतो.

आजही संध्याकाळी पुस्तक उघडतो.

कारण माझा विश्वास आहे—

शरीराला अन्न जगवतं.

पण मनाला विचार जगवतात.

जर या लेखातून तुम्हाला एकच गोष्ट घ्यायची असेल...

तर माझा आहार घेऊ नका.

माझी पद्धतही तशीच्या तशी स्वीकारू नका.

फक्त एक निर्णय घ्या.

स्वतःला दिलेला शब्द...

कधीही मोडायचा नाही.

तो शब्द आरोग्याचा असो.

वाचनाचा असो.

कुटुंबाचा असो.

किंवा स्वतःला घडवण्याचा.

कारण...

ज्या दिवशी माणूस स्वतःचा विश्वास जिंकतो...

त्या दिवशी जग जिंकणं महत्त्वाचं राहत नाही.


समर्पण

हा लेख माझ्या मुलगा "मयान"ला समर्पित...

ज्याच्या जन्माने मला वडील होण्याचा आनंद दिला.

आणि ज्याच्या अस्तित्वाने मला स्वतःला नव्याने घडवण्याची प्रेरणा दिली.

जर माझ्या आयुष्यात मयान आला नसता...

तर कदाचित हा लेखही जन्माला आला नसता.


लेखक परिचय

विजय गायकवाड

"मी पुस्तकातील दोन ओळींमधील मोकळ्या जागेचा प्रवासी आहे."

मी फौंड्रीत काम करणारा एक सामान्य माणूस आहे.

पण मला विश्वास आहे की सामान्य माणसांच्या आयुष्यातही असामान्य कथा दडलेल्या असतात.

वाचन, चिंतन, स्व-अभ्यास आणि आरोग्यदायी जीवनशैली या चार गोष्टींनी माझ्या आयुष्याला नवी दिशा दिली.

"मयान विजय विचार (MVV)" या उपक्रमातून मी विचार, वाचन, सत्यशोधन आणि आत्मपरिवर्तनाचा प्रवास समाजापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे.

जर माझ्या या प्रवासाने एका जरी माणसाच्या मनात बदलाची ठिणगी पेटली...

तर हे लिखाण सार्थकी लागलं, असं मी मानेन.



The True Story of an Ordinary Man's Extraordinary Decision.

© कॉपीराइट सूचना

© 2026 विजय गायकवाड. सर्व हक्क राखीव.

लेखक : विजय गायकवाड
वैचारिक उपक्रम : मयान विजय विचार (MVV)


या लेखातील सर्व मजकूर, विचारांची मांडणी, रचना आणि साहित्यिक अभिव्यक्ती यांवरील सर्व हक्क लेखकाकडे राखीव आहेत.

लेखकाची पूर्वलिखित परवानगी घेतल्याशिवाय हा लेख संपूर्ण किंवा अंशतः कोणत्याही माध्यमात पुनर्मुद्रित, प्रकाशित, भाषांतरित, साठवून ठेवणे किंवा व्यावसायिक कारणांसाठी वापरणे मान्य नाही.

या लेखामधील ऐतिहासिक व्यक्ती, वैज्ञानिक संदर्भ आणि सार्वजनिक माहिती केवळ विचार स्पष्ट करण्यासाठी वापरण्यात आली आहे. वैयक्तिक अनुभव, आत्मकथन, लेखनशैली, रचना आणि चिंतन हे लेखकाचे स्वतंत्र बौद्धिक संपादन आहे.


लेखक

विजय गायकवाड

"मी पुस्तकातील दोन ओळींमधील मोकळ्या जागेचा प्रवासी आहे."

संस्थापक व संपादक
मयान विजय विचार (MVV)

स्व-अभ्यास | सत्याधिष्ठित विचार | आरोग्यदायी जीवनशैली | आत्मपरिवर्तन

अधिक लेखांसाठी :
www.vijaygaikawad.com


"मूळ विचारांचा मान राखणे हीच आमची ओळख. जे ज्याचे आहे, त्याचे श्रेय त्यालाच."



7/21/26

प्राण्यांमधलं फलन / Fertilization in animals

याचा अर्थ पृथ्वीवर आता जिवंत असलेले,भूतकाळात होऊन गेलेले आणि भविष्यात जन्माला येणारे अशी सगळी माणसं मानवप्राण्याच्या अस्तित्वापासूनच जर्म सेल्समध्ये कठे ना कुठे अस्तित्वात होती! या संकल्पनेला 'प्रिफॉर्मेशन' असं भारदस्त नावही होतं । जर्म सेल म्हणजे 'बीजपेशी.' बीजांडं आणि शुक्रजंतू या दोन्हींनाही आपण जर्म सेल म्हणू शकतो.मजा म्हणजे ही संकल्पना चुकीची असूनही,यातही स्त्रियांच्या बाजूनं बोलणारे आणि पुरुषांच्या बाजूनं बोलणारे असे दोन गट होते.यातले स्त्रियांच्या बाजूनं बोलणारे ही 'सूक्ष्म माणसं' बीजांडात असतात असं म्हणायची तर पुरुषांच्या बाजूनं बोलणारे 'सूक्ष्म माणसं' पुरुषाच्या शुक्रजंतूमध्येच असली पाहिजेत असं म्हणत होती. 'निकोलस हार्टसॉकर' यानं तर मायक्रोस्कोपखाली अशी सूक्ष्म मुलं तरंगताना बघितल्याच्या चक्क बढाया मारल्या होत्या.गंमत म्हणजे बरेच लोक त्याच्यावर विश्वासही ठेवत होते.एकूणच हा सगळा गोंधळ आणि कल्पनांचा खेळ होता.हे अगदी आता आतापर्यंत म्हणजे साधारणपणे गेल्या तीनशे-साडेतीनशे वर्षांपर्यंत चालू होतं.पण नंतर जेव्हा मायक्रोस्कोपचा शोध लागला तेव्हा खरी गोष्ट उघड झाली !

त्याचं असं झालं की 'कास्पर फ्रेडरिक वूल्फ' (१७३३-१७९४) या वैज्ञानिकानं कोंबड्यांच्या फलित झालेल्या अनेक अंड्यांचा मायक्रोस्कोपखाली अभ्यास केला.तेव्हा त्याच्या असं लक्षात आलं,की त्या कोंबड्यांच्या पिलांचं हृदय अगदी सुरुवातीला एका लहानशा बिंदूसारखं दिसतं आणि नंतर ते वेगवेगळा आकार घेत वाढत जातं.शिवाय,सुरुवातीला अंड्यामध्ये कोणतेही अवयव नसतात.ते सगळेच अवयव नंतर तयार होतात असं दाखवून देऊन वूल्फनं प्रिफॉर्मेशनची थिअरी खोडून काढली आणि परंपरावाद्यांना चांगलाच धक्का दिला.यालाच नंतर 'एपिजेनेसिस' म्हणजेच 'नव्यानं निर्माण होणं' असं नाव मिळालं.पण आश्चर्य म्हणजे अ‍ॅरिस्टॉटलनं 'प्रिफॉर्मेशन' चुकीचं असून, 'एपिजेनेसिस' हेच बरोबर असण्याची शक्यता याआधीच दोन हजार वर्ष व्यक्त केली होती ! पुरुष आणि स्त्री यांच्या समागमानंतर पुरुषाचा शुक्रजंतू आणि स्त्रीचं बीजांड एकत्र येऊन गर्भधारणेला सुरुवात होते.सोळाव्या शतकात आता स्त्रीच्या प्रजननाच्या अवयवांची माहिती नव्यानं तपासून त्या माहितीचा पुन्हा अभ्यास व्हायला लागला होता.१५५९ मध्ये अ‍ॅनॅटॉमिस्ट रिआल्डो कोलंबो यानं 'क्लायटॉरिस' शोधल्याचा दावा केला होता! त्यानं क्लायटॉरिसला 'इंटर्नल पेनिस' असं म्हटलं होतं.शिवाय,त्यानं हेही सांगितलं होतं,की गर्भधारणा होताना त्या स्त्रीला कदाचित लैंगिक सुख मिळत नसावं,याच शतकाच्या शेवटी गॅब्रिएल फॅलोपिओ यानं फैलोपियन ट्यूब्जचा शोध लावला होता.या ट्यूब्जचं नावही त्याच्याच नावावरून पडलं होतं

पण या ट्यूब्जचं काम काय असतं हे अजून कुणालाही कळलेलं नव्हतं.याच दरम्यान मोठ्या प्रमाणात शवविच्छेदनं (डिसेक्शन्स) व्हायला लागली आणि मानवी शरीरातले अनेक अवयव शोधले जायला लागले. आणि त्यांना ती शोधणाऱ्या वैज्ञानिकांची नावं दिली जायला लागली.आपल्या शरीरातल्या किमान ३/४ गोष्टींना तर या फैलोपिओचंच नाव आहे.

उदाहरणार्थ, हेनलेज लूप,फैलोपियन नव्हं,ब्रोकाज एरिया,बोअमन्स कॅप्सूल.या यादीत पुढे शंभर-दीडशे वैज्ञानिक येतात। अशा प्रकारे एक एक वैज्ञानिक आपण शोधलेल्या अवयवाला आपली नावं द्यायला लागला. 

याच शोधांमध्ये ओव्हरीजचा शोध लागला.बीजकोषाचा (फॉलिकल) शोध मात्र रेग्नियर डी ग्राफ या डच वैज्ञानिकाला अपघातानंच लागला.त्यानं त्याला 'ग्राफायन फॉलिकल' हे नाव दिलं.आता हे नाव जास्त कुणी वापरत नाही,आपण याला बीजकोष (फॉलिकल) म्हणतो.यातच बीजांड असतं.खरं तर फॉलिकल हे ओव्युलेशनच्या दरम्यान अर्धा ते दोन सेंटिमीटरपर्यंत मोठं होऊ शकतं.त्यामुळे ते सापडणं त्यामानानं सोपं होतं.आणि नंतर फॉलिकल फुटून त्यातून बीजांड (एग) बाहेर येतं.बीजांड मात्र ०.१ मिलिमीटर इतक्याच आकाराचं असतं. त्याचा शोध नंतर लागणार होता.

विल्यम हार्वेनं (१५७८-१६५७) स्त्रियांच्या प्रजननाच्या अवयवांचा बराच अभ्यास केला होता.त्यानं तर राजाच्या पाळलेल्या हरणांवर अनेक प्रयोग केले होते. त्यातून त्यानं प्राण्यांमधल्या अंड्याचा शोध लावला होता.हार्वेचं वैद्यकशास्त्रातलं काम हे विज्ञानाच्या प्रगतीला बऱ्यापैकी वेग देणारं असल्यामुळे हार्वे हा जुने तात्त्विक विचार आणि नवे प्रयोगशील शोध यांच्यामधला दुवा मानला जातो.आता स्त्रीच्या शरीरात बीजांड तयार होते असा शोध लागल्यानंतर काही लोकांना माणसाचा जन्म अंड्यातून होतो असं वाटत होतं.या सगळ्या नाट्यात आता अँटोनी फॉन लेव्हेनहूक (१६३२-१७२३) यानं माणसाचा जन्म हा अंड्यातून होत नसून अ‍ॅनिमलक्युल्समधून होतो आणि हे अ‍ॅनिमलक्युल्स पुरुषाच्या वीर्यामध्ये असतात असं सांगून जगाला हादरवूनच सोडलं ! याचं कारण माणसाच्या वीर्यातले स्पर्ज त्यानं चक्क मायक्रोस्कोपखाली पाहिले होते.लेव्हेनकनं माणसाच्या स्पर्जचा खूपच अभ्यास केला होता. त्यानं आपल्या अनेक शोधांबद्दल रॉयल सोसायटीला अनेक पत्रं लिहून कळवलं होतं. स्पर्जबद्दल १६७७साली तो लिहितो,

"स्पर्म हे माणसाच्या सीमेनमध्ये (वीर्यात) असणारे जिवंत प्राणी आहेत आणि ते वेगात हालचाल करत असतात."यावर रॉयल सोसायटीनं त्याला इतर प्राण्यांच्या सीमेनमध्येही असे स्पर्ज दिसतात का हे शोधायला सांगितलं होतं.

त्यानंतर निकोलस हार्टसॉकर यानं कोंबड्याच्या वीर्यामध्ये आपण हे अ‍ॅनिमलक्युल्स आधी पाहिले असल्याचा दावा केला.पण त्यानं ते लेव्हेनहूकच्या नंतर काहीच महिन्यांनी १६७८ मध्ये पाहिले होते. त्या पाठोपाठ पॅरिसच्या एका नियतकालिकात ख्रिश्चन हायगेन यानंही १६७८ मध्येच आपण अ‍ॅनिमलक्युल्स पाहिल्याचा दावा केला होता.गंमत म्हणजे या दोघांनीही आपापले शोधनिबंध जाहीर करण्यापूर्वी रॉयल सोसायटीला आलेलं लेव्हेनहूकचं पत्र वाचलेलं होतं,हे नंतर सिद्ध झालं!

आता कोणत्याही प्राण्याच्या वीर्यात मोठ्या प्रमाणात हे 

अ‍ॅनिमलक्युल्स असतात हे सिद्ध झालं होतं.पण हे कशासाठी असतात,ते इतक्या वेगात हालचाली का करत असतात आणि या प्राण्यांचा गर्भधारणेशी काही संबंध असेल का याचा शोध मात्र अजूनही खूप दूर होता.गंमत म्हणजे फॉलिकलचा (बीजकोषाचा) शोध लागूनही बीजांडाचा (एगचा) शोध अजून लागला नव्हता.सस्तन प्राण्यांमधल्या बीजांडाचा शोध १८२७ साली कार्ल अर्स्ट फॉन बेइर (Carl Ernst von Baer) यानं लावला. यानंच 'स्पर्मेटोझुआ' हा शब्दही पहिल्यांदा निर्माण केला होता.गंमत म्हणजे १८३५ साली अ‍ॅनॅटॉमिस्ट रिचर्ड ओवेन यानं स्पर्म म्हणजे चक्क पॅरासाइट्स असावेत असं वाटून त्यांना वळवळणाऱ्या प्राण्यांच्या गटात टाकून दिलं होतं! त्यानंतर १८४१ साली अल्बर्ट फॉन कोलिकर (Albert von Koliikar) यानं स्पर्मेटोझुआ हे काही पॅरासाइट्स नाहीत तर ते आपल्याच शरीरातल्या टेस्टीजमध्ये तयार होणाऱ्या आणि पुढे पुढे प्रवास करू शकणाऱ्या पेशीच आहेत हे दाखवून दिलं.पण तरीही गर्भधारणेमध्ये स्पर्मेटोझुआची भूमिका काय आहे हे अजूनही माहीत नव्हतं.आतापर्यंत 'प्रिफॉर्मेशनची थिअरी' म्हणजे स्पर्ममध्येच पूर्णाकृती मूल आधीच तयार असतं ही थिअरी बऱ्यापैकी मूळ धरून होती. स्वतःला वैज्ञानिक म्हणवणाऱ्या अनेकांनी स्पर्ममध्ये पूर्णाकृती लहान मूल पाहिलेलं असल्याचा दावा केला होता,पण या कल्पनेला लवकरच तडा जाणार होता.

इटालियन वैज्ञानिक लझारो स्पॅलान्झानी (१७२९-१७९९) यानं १७७० साली सस्तन प्राणी, मासे, आणि पाण्यात राहणाऱ्या अनेक प्राण्यांचं वीर्य (सीमेन) तपासलं होतं.त्यावर त्यानं अनेक प्रयोगही करून पाहिले होते.त्यानंतर त्यानं बेडकांवर प्रयोग करून बेडकांच्या ऊसाइट्स (अंडी) ही सीमेनशी संपर्क आल्यानंतरच फर्टिलाइझ (फलित) होतात हे पाहिलं होतं.त्यावरून फर्टिलायझेशनसाठी बीजांड आणि सीमेन म्हणजेच स्पर्ज ही दोन्हीही गरजेची असावीत असा निष्कर्ष काढला.गंमत म्हणजे हे प्रयोग त्यानं प्रयोगशाळेच्या उपकरणांमध्ये केले असल्यानं हे पहिलं 'इन व्हिट्रो फर्टिलायझेशन' (IVF) म्हटलं जातं !

त्यानंतरच्या प्रयोगांमध्ये त्यानं सीमेन गरम करून, त्यात व्हिनेगर,मीठ किंवा स्पिरिट असे वेगवेगळे पदार्थ घालून नंतर ते ऊसाइट्सवर (अंड्यांवर) सोडून पाहिलं तेव्हा असं प्रक्रिया केलेलं सीमेन ऊसाइट्स फलित (फर्टिलाइझ) करू शकत नाही हे त्याच्या लक्षात आलं. पण आणखी मजा म्हणजे जर सीमेन बारीक फिल्टरमधून गाळलं आणि नंतर फिल्ट्रेटमध्ये (म्हणजे गाळणीच्या वर राहिलेला भाग) पाणी घातलं आणि ते ऊसाइट्सवर टाकलं तरीही त्यापासून बेडकाची अंडी फलित होतात हे त्यानं पाहिलं.

इतके प्रयोग केल्यानंतर त्यानं खरं तर कोणत्याही प्राण्याच्या मादीच्या बीजांडाचा स्पर्मशी संपर्क आला तर ते बीजांड फर्टिलाइन (फलित) होतं असा निष्कर्ष काढायला हवा होता,पण स्पर्मेटोझुआ हे पॅरासाइट्स असतात ही त्याची समजूत अजूनही दव होती.त्यामुळे फिल्ट्रेटमध्ये ऊसाइट्सला फर्टिलाइझ करणारा दुसरा कोणतातरी भाग असावा असं त्याला वाटलं आणि त्यानं चक्क हे प्रयोग तिथेच सोडून दिले!

प्राण्यांमध्ये स्पर्म आणि वनस्पतींमध्ये पोलन ग्रेन यामध्ये पूर्ण जीव आधीच असतात. ते फक्त स्त्रीच्या बीजांडामध्ये इम्प्लांट (रोपण) झाले की त्यातून त्या आधीच असलेल्या जिवाची वाढ सुरू होते असं सतराव्या आणि अठराव्या शतकातल्या अभ्यासकांना वाटत होतं. हीच प्रिफॉर्मेशनची किंवा 

अ‍ॅनिमलक्युल्सची थिअरी होती.

त्यानंतर एकोणिसाव्या शतकात मात्र स्विस फिजिशियन जाँ लुईस प्रिव्होस्ट (Jean Louis Prevost) आणि फ्रेंच वैज्ञानिक जाँ बाप्टिस्ट ड्यूमा (Jean Baptiste Dumas) या दोघा वैज्ञानिकांनी स्पॅलान्झानीचेच प्रयोग पुन्हा करून पाहिले.पण त्यांनी या वेळी प्रयोग करण्याच्या भांड्यात स्पर्मच्या संख्येपेक्षा जास्त बीजांडं ठेवली.मग त्यात जितके स्पर्म होते तितकीच बीजांडं फर्टिलाइझ होतात हे त्यांच्या लक्षात आलं.यातून आता मात्र त्यांनी स्पर्मेटोझुआ हे काही पॅरासाइट्स नाहीत तर ते फर्टिलायझेशन करणारे मुख्य घटक आहेत हे त्यांच्या लक्षात आलं.त्यानंतर त्यांनी एक स्पर्म एकाच अंड्याला फर्टिलाइझ करतो असं दाखवून दिलं.पण या दोघांनी स्पर्म हा फर्टिलायझेशन करतो हे जरी दाखवून दिलं असलं, तरी त्यांनी फर्टिलायझेशन कसं होतं ते मात्र पाहिलं नव्हतं. ते हेन्री नेल्सन यानं १८५२ साली पाहिलं.तो वर्णन करतो, "आज पहिल्यांदा बीजांडामध्ये स्पर्म अक्षरशः आपलं डोकं घुसवताना मी स्पष्टपणे पाहू शकलो!" त्यानंतर लगेचच १८५३ मध्ये जॉर्ज न्यूपोर्ट यानं पाण्यातल्या प्राण्यांमध्ये फर्टिलायझेशन होताना पाहिलं. त्यानंतर एडुवर्ड बेनेडिन (Edouard van Beneden) यानं १८७५ मध्ये आणि ऑस्कर हर्टविग यानं १८७६ मध्ये सस्तन प्राण्यांमध्ये फर्टिलायझेशन होताना पाहिलं.त्यानंतर प्रिव्होस्ट आणि ड्यूमा याच जोडगोळीनं ससा आणि कुत्रे यांच्यावर अनेक प्रयोग करून फर्टिलायझेशन हे फैलोपियन ट्यूब्जमध्ये होत असल्याचं पाहिलं.त्यातून मग फैलोपियन ट्यूब्ज या ओव्हम (बीजांड) युटेरसपर्यंत वाहून नेत असल्याचं लक्षात आलं.

आता नव्या जिवाचा जन्म होण्यापूर्वी गर्भधारणा नेमकी कशी होते, पुरुषाच्या वीर्याचं, स्पर्जचं, स्त्रीमधल्या ऊसाइट्सचं (बीजकोषाचं) आणि ओव्हम्सचं (बीजांड) काय महत्त्व आहे हे आता जवळपास लक्षात यायला लागलं होतं.

हा भाग संपला. - समाप्त

7/19/26

प्राण्यांमधलं फलन / Fertilization in animals

लैंगिक प्रजननामध्ये दोन वेगवेगळ्या लिंगांच्या प्राण्यांची गॅमेट्स (सेक्स सेल्स) एकत्र येऊन त्यापासून नवा जीव जन्म घेतो.मादीकडून बीजांड आणि नराकडून शुक्रजंतू येतात.मासे,बेडूक आणि पाण्यातल्या अनेक जलचरांमध्ये फर्टिलायझेशन (फलन) हे पाण्यातच होतं. नर आणि मादी आपापली बीजं पाण्यात सोडतात आणि ती पाण्यातच फलित होतात.हे फलन मादीच्या शरीराच्या बाहेर होत असल्यानं या प्रकाराला एक्सटर्नल फर्टिलायझेशन म्हणतात.पण तेच फलन सस्तन आणि पाण्याबाहेर राहणाऱ्या प्राण्यांमध्ये मादीच्या शरीरात होतं म्हणून त्याला इंटर्नल फर्टिलायझेशन म्हणतात.यात बीजांड हे मादीच्या शरीरात स्थिर असतं आणि शुक्रजंतूंनाच बीजांडापर्यंत यावं लागतं.फर्टिलायझेशन (फलन) मादीच्या शरीरातलं असो किंवा मादीच्या शरीराच्या बाहेरचं असो, शुक्रजंतूंचा प्रवास हा द्रव माध्यमातून होतो.कधी हे माध्यम नदी किंवा समुद्रातलं पाणी असेल किंवा कधी ते मादीच्या शरीरातला जननमार्ग असेल.त्यातही शुक्रजंतूंना पोहायला द्रव माध्यम उपलब्ध असतं. शुक्रजंतूंचा आकार पाहता ते खरं तर फार लांब अंतरावरून प्रवास करून बीजांडापर्यंत येतात. प्राण्यांमध्ये बीजांड हे कायमच शुक्रजंतूपेक्षा मोठं असतं आणि जेव्हा बीजांड स्थिर असतं तेव्हा शुक्रजंतूच बीजांडापर्यंत येतात.

बेडकासारख्या अँफिबियन प्राण्यांमध्ये शुक्रजंतू आणि बीजांड हे दोन्हीही पाण्यात तरंगणारे,वाहणारे किंवा पोहणारे असू शकतात.

इंटर्नल फर्टिलायझेशन करणाऱ्या प्राण्यांमध्ये गॅमेट्स वाहून नेणारे लैंगिक अवयव असतात.पक्ष्यांमध्ये त्यांना क्लोएका म्हणतात. त्यामुळेच पक्ष्यांच्या समागमाला 'क्लोएकल किस' म्हणतात.तर प्राण्यांमध्ये नराचं लिंग आणि मादीची योनी असते.पक्ष्यांमध्ये समागम झाल्यानंतर पक्ष्याचं अंडं मादीच्या पोटातच फलित होतं. आणि त्यावर कॅल्शियमचं आवरण येऊन ते अंडं बाहेर पडतं.आणि मग त्यात पिलाची वाढ मात्र त्या अंड्यात मादीच्या शरीराच्या बाहेर होते.म्हणजेच पक्ष्यांमध्ये फर्टिलायझेशन तर मादीच्या शरीरात होतं,पण गर्भाची वाढ मात्र मादीच्या शरीराबाहेर होते.सस्तन प्राण्यांमध्ये मात्र फर्टिलायझेशन आणि गर्भाची वाढ हे दोन्हीही मादीच्या शरीरातच होतात. फर्टिलायझेशनचे असे वेगवेगळे प्रकार असले तरी शुक्रजंतूनं बीजांडपेशीचं फर्टिलायझेशन करणं ही प्रक्रिया मात्र सगळ्या प्राण्यांमध्ये (अ‍ॅनिमल किंग्डममध्येच) सारखीच असते हे मात्र सजीवांमधल्या अ‍ॅनिमल किंग्डमचं एक फार मोठं वैशिष्ट्य म्हणावं लागेल.असं सगळं असलं तरी माणसाला प्राण्यांमध्ये फर्टिलायझेशन कसं होतं हे मात्र कळत नव्हतं.कारण आपण अनेकदा प्राणी समागम करताना पाहू शकतो, गर्भामध्ये वेगवेगळ्या अवस्थेत असलेले प्राणी आणि मानवी अर्थक पाहू शकतो,

अंड्यातून पिलू बाहेर येताना पाहू शकतो आणि प्राण्याच्या पिलाचा जन्म होतानाही पाहू शकतो.पण समागम ते प्राण्याचा जन्म हा प्रवास मात्र अनेक शतकं कळण्याच्या पलीकडे होता. त्यातूनही बीजांड आणि शुक्राणू यांची भूमिका नेमकी काय असते याचं कोडं खूपच मोठं होतं.

१८७५ साली मात्र जर्मन वैज्ञानिक ऑस्कर हर्टविग यानं समुद्रातल्या सिअर्चिन या प्राण्याचे गॅमेट्स एकत्र येऊन होणारी फर्टिलायझेशनची प्रक्रिया पाहिली.या नंतर मात्र माणसाला फर्टिलायझेशन या प्रक्रियेबद्दलचं गूढ उकलत गेलं.बहुतांश प्राण्यांमध्ये शुक्राणू हे बीजांडाकडे पोहत जातात.पण शुक्राणूंसाठी हा प्रवास खूप अवघड आणि अनेक अडथळ्यांचा असतो.एका बीजांडाला फलित करायला लाखो किंवा काही वेळा कोट्यवधी शुक्रजंतू एका समागमातून मादीच्या योनीमध्ये सोडले जातात. पण माणसामध्ये प्रत्यक्ष बीजांडापर्यंत फक्त २००च शुक्रजंतू पोहोचतात तर उंदरामध्ये त्यांची संख्या ही केवळ २० इतकी कमी असते.

एक्सटर्नल फर्टिलायझेशनमध्ये अनेक बीजांड आणि शुक्रजंतू पाण्यात सोडली जातात.पण नदी आणि समुद्रात अशा प्रकारची अनेक बीजांड आणि शुक्रजंतू असणार.पण मग नेमक्या आपापल्या जातीच्या प्राण्यांचे शुक्राणू आपल्याच जातीच्या मादीची अंडी कशी फलित करतात? या प्रश्नानं माणूस कायमच आश्चर्यचकित झालाय. याचं उत्तर अमेरिकन एंब्रियॉलॉजिस्ट फ्रैंक लिली (Frank Lillie) यानं १९१२ साली दिलं. पाण्यात तरंगणाऱ्या फलित न झालेल्या बीजांडातून काही विशिष्ट प्रकारची रसायनं पाण्यात सोडली जातात आणि ती चक्क स्पर्मच्या पेशी आवरणातून आत बाहेर जाऊ शकतात.ही रसायनं स्पर्मला ओळखू येतात आणि त्यांचं कॉन्सन्ट्रेशन कुठे वाढत चाललं आहे हे त्या स्पर्मला कळतं आणि तो स्पर्म मग त्या दिशेनं जायला लागतो! हे फ्रैंकला एका फारच साध्या पण अभिनव प्रयोगातून लक्षात आलं.त्यानं एका पाण्यानं भरलेल्या बाऊलमध्ये सिअर्चिनचे काही स्पर्म घेतले.खरं तर त्या पाण्यात बीजांड नसल्यामुळे ते भरकटल्यासारखेच इकडेतिकडे उगाचच फिरत होते.पण थोड्या वेळानं फ्रैंकनं सिअर्चिनचं बीजांड ठेवलेल्या बाऊलमधल्या पाण्याचा एक थेंब फक्त स्पर्म असलेल्या बाऊलमध्ये टाकला.

काहीच वेळात त्या पाण्याच्या थेंबाभोवती चक्क काही स्पर्मनी फेर धरला होता। याचाच अर्थ फलित न झालेलं बीजांड पाण्यात नक्की काहीतरी ओळख पटणारी रसायनं सोडत असणार हे सिद्ध झालं होतं.

यानंतर हे रसायन नेमकं काय होतं हे १९८१ साली फार्माकोलॉजिस्ट जे रॅडॉल हान्सब्रोग (J Randall Hansbrough) आणि डेव्हिड गार्बर्स (David Garbers) यांनी शोधून काढलं. त्याला त्यांनी रिसॅक्ट असं नाव दिलं. २००३ मध्ये जर्मन बायॉफिजिसिस्ट अर्लिच बेंजामिन कौप (Urlich Benjamin Kaupp) यानं तर असं दाखवून दिलं,की स्पर्म केवळ एका रिसॅक्टच्या रेणूलासुद्धा ओळखून त्यानुसार आपल्या पोहण्याची दिशा ठरवू शकतो!

तर सस्तन प्राण्यांमधल्या इंटर्नल फर्टिलायझेशनमध्ये स्पर्म्जना ऱ्हिओटॅक्सिस नावाच्या हालचालीमुळे मार्गदर्शन मिळतं.

स्पर्म्जचा हा प्रवास उंदरांवर आणि माणसांवर प्रयोग करून कियोशी मिकी (Kiyoshi Miki) आणि डेव्हिड क्लॅफम (David Clapham) यांनी २०१३ मध्ये शोधून काढला.मादी उंदीर आणि स्त्रिया यांच्या प्रजनन मार्गाच्या योनी,गर्भाशय आणि फॅलोपियन ट्यूब त्वचेतून एक प्रकारचा द्रव योनीमार्गाद्वारे सवत असतो.त्यामुळे योनीमार्गात असलेला म्युकस आणि इतर टाकाऊ पदार्थ बाजूला सारले जाऊन स्मर्जना बीजांडापर्यंत पोहोचण्याचा मार्ग मोकळा होतो.पण गंमत म्हणजे नेमके स्पर्म्जही त्याच मार्गावरून पण उलट दिशेनं प्रवास करत असतात.मग यातूनच त्या स्पर्म्जना आपल्याला नेमकं कुठं जायचं आहे याची दिशा कळते आणि ज्या रस्त्यात जास्त राडारोडा असेल त्या रस्त्यातून आपल्याला जायचं आहे हे त्या स्पर्म्जना कळतं. गंमत म्हणजे याच पद्धतीमुळे स्पर्म्जच यातून मार्गक्रमण करू शकतात. त्यामुळे केवळ सक्षम स्पर्म्जच बीजांडापर्यंत पोहोचतात आणि बीजांडाला फलित करतात.

आणखी एका संशोधनानुसार बीजांडाच्या जवळपास कायम प्रोजेस्टेरॉन सवलं जातं.त्यामुळे ज्या दिशेकडून येणाऱ्या राडारोड्यात प्रोजेस्टेरॉन जास्त असेल त्या दिशेनं मग स्पर्म्ज आपला प्रवास करतात असं दिसून आलं आहे.

एकदा का काही स्पर्म्ज बीजांडापाशी पोहोचले की त्यांच्यापुढे पुन्हा बीजांडावरचे आणखी तीन अडथळे पार करण्याचं आव्हान असतं.

पहिला अडथळा करोना रेडिएटाचा असतो. दुसरा हा जेली लेयरचा असतो, तिसरा अडथळा हा व्हायटेलाइन एनव्हलपचा असतो. त्यानंतरच खऱ्या अर्थानं या गॅमेट्सचं मिलन होतं.

सस्तन प्राण्यांमध्ये ही जेली इलास्टिक आणि घट्ट द्रवाची असते.क्युम्युलस पेशींची ती बनलेली असते. या पेशी बीजांडाला पोषण करत असतात.स्पर्म आपली काही एन्झाइम्स आणि आपलं बळ (ब्रूट फोर्स) वापरून ही हा जेलीचा थर भेदून आत पोहोचतात.त्यानंतर पुढचा अडथळा बीजांडाच्या एनव्हलपचा (आवरणाचा) असतो.सस्तन प्राण्याच्या बीजांडाच्या एनव्हलपला आपण झोना पेल्युसिडा म्हणतो.जेव्हा स्पर्म या झोना पेल्युसिडापाशी पोहोचतो,तेव्हा तो तिचं ग्लायकोप्रोटीन (झेडपी १,झेडपी२इ.) ओळखतो. गंमत म्हणजे प्रत्येक प्राण्याच्या बीजांडावर असलेल्या झोना पेल्युसिडावर वेगळं ग्लायकोप्रोटीन असतं आणि ते त्याच जातीच्या नराच्या स्पर्मला ओळखू येतं. त्यामुळेच स्पर्म इथपर्यंत पोहोचूनही आपल्याच स्पिशीजच्या मादीकडून फलित होतो.हे पाहिलं की निसर्गाच्या किमयेला दाद द्यावी तितकी थोडीच असं वाटतं.आणि मग स्पर्मनं झोना पेल्युसिडा ओळखली की तो स्पर्म आपल्या डोक्यावरच्या अ‍ॅक्रोसोम नावाच्या टोपीत असलेलं एन्झाइम त्यावर सोडतो आणि त्यात चक्क ती झोना पेल्युसिडा विरघळते आणि त्यातून स्पर्म आत जातो. आता तो पेशीच्या शेवटच्या अडधळ्यापर्यंत म्हणजेच सेल मेंब्रेनपर्यंत पोहोचतो आणि शेवटी एकाच भाग्यवंत स्पर्मला बीजांडाच्या आतमध्ये प्रवेश मिळतो आणि त्या स्पर्ममधलं जेनेटिक मटेरियल शेवटी त्या बीजांडात सोडतो.आता झोना पेल्युसिडा चक्क आपल्यावरचे राहिलेले ग्लायकोप्रोटीन्स झडून टाकते आणि त्यामुळे त्यानंतर दुसऱ्या स्पर्मला आत येता येत नाही.या घटनेला ब्लॉकिंग पॉलिस्पर्मी म्हणतात.आता बीजांड तर फलित होण्याची वाटच पाहत असतं आणि त्यासाठी ते आपली सेल सायकल थांबवून बसलेलं असतं.सेल सायकल थांबते म्हणजे त्यात विशिष्ट ब्लॉक्स तयार होतात,हे आपण सेल सायकल या प्रकरणात पाहिलंच आहे.

बीजांडाला फलित करताना स्पर्म नेमकं तेच ब्लॉक सोडवणारं एन्झाइम बीजांडात सोडतो.शिवाय,

आपण इतक्या लांबून जपून आणलेले क्रोमोसोम्सही बीजांडाच्या हवाली करतो आणि स्पर्म म्हणून स्वतःचं अस्तित्व बीजांडाच्या स्वाधीन करून संपून जातो. इथेच झायगोट निर्माण होतो.

आता बीजांडामध्ये सगळ्या गुणसूत्राच्या पुन्हा जोड्या होतात आणि बीजांडाची थांबलेली सेल सायकल मायटॉसिसनं सुरू होते.याला गर्भधारणा झाली असं म्हटलं जातं.वेगानं विभाजित होणाऱ्या झायगोटला आता एंब्रियो म्हटलं जातं.

अच्युत गोडबोले,अमृता देशपांडे,मधुश्री पब्लिकेशन सजीव.

एका फलित पेशीपासून (झायगोटपासून) गर्भाशयात संपूर्ण वाढ झालेलं अर्भक तयार होणं ही घटना खरं तर प्रचंड वेगात होणारी,क्लिष्ट आणि त्याचबरोबर अत्यंत नाट्यमय असते.

माणसासाठी हा काळ साधारणपणे नऊ महिने आणि दहा दिवसांचा असतो.एखाद्या स्त्रीची पाळी चुकल्यानंतर पुढच्या नऊ महिन्यांनंतर ती अर्भकाला जन्म देते हे पूर्वी सगळ्यांनीच पाहिलं होतं. पण गर्भधारणा होते म्हणजे नेमकं काय होतं? मातेच्या पोटात गर्भ कसा वाढतो? मुलगा होणार की मुलगी होणार? जन्माला आलेलं अर्भक आई-वडिलांचे कोणकोणते गुण घेणार? यावर पूर्वी संशोधन झालेलं नसल्यामुळे याबद्दल तेव्हा अनेक मजेशीर कल्पना होत्या. आता मात्र विज्ञानाच्या प्रगतीमुळे गर्भाची वाढ होऊन मूल कसं जन्माला येतं याविषयी आपल्याला बरंचसं माहीत झालंय.

पूर्वी हिप्पोक्रॅट्स आणि इतर ग्रीक विचारवंत यांनी पॅब्जेनेसिस (सर्वोत्पत्तिवाद) ची कल्पना मांडली होती. पुरुषाच्या शरीरातल्या प्रत्येक अवयवातून काही कण हे त्याच्या वीर्यामध्ये जातात,तसंच स्त्रीच्या प्रत्येक अवयवातून वेगवेगळे कण तिच्या गर्भाशयातल्या बीजांडात जातात आणि पुनरुत्पादनाच्या वेळी प्रत्येक अवयवासाठी असलेले वडिलांचे आणि आईचे कण एकत्र येतात आणि त्यातूनच होणाऱ्या मुलाचे वेगवेगळे अवयव बनतात आणि त्यामुळेच साहजिकच मुलामध्ये आई आणि वडिलांचे असे दोघांचेही गुण येतात अशी ही थिअरी होती.गंमत म्हणजे उत्क्रांतिवादाची प्रसिद्ध थिअरी मांडणाऱ्या डार्विननंही ही थिअरी उचलून धरल्यामुळे तिच्याविरुद्ध बोलणं हे एकोणिसाव्या शतकापर्यंत अवघडच होतं !

पण ऑगस्ट वाईजमन (१८३४-१९१४) या जर्मन जैववैज्ञानिकानं उंदरांवर प्रयोग करून ही थिअरी खोडून काढली.त्यानं काही उंदरांच्या शेपट्या कापल्या.त्यामुळे पॅन्जेनेसिसप्रमाणे त्यांच्या पुढच्या पिढीत ते शेपटीचे 'कण' जाऊ शकणार नव्हते. पण तरीही त्या उंदरांना पिलं झाल्यानंतर,तर त्यांना मात्र लांबच शेपट्या होत्या! त्यानं पुढच्या अनेक पिढ्यांतल्या उंदरांच्या शेपट्या कापल्या तरी शेवटी पुढच्या पिढीतल्या उंदरांना नॉर्मल शेपटी येतच राहिली.

खरं तर शेपटी कापल्यानंतर पुनरुत्पादनाच्या वेळी शेपटीतले ते कण नवीन पिढीत जायला नको होते.पण तसं होत नव्हतं.याचा अर्थ 'कुणीही एका पिढीत कमावलेले किंवा गमावलेले गुण हे नवीन पिढीत जात नाहीत' असं सांगून त्यानं 'जर्म थिअरी' मांडली.त्यातून त्यानं सोमॅटिक सेल्स (शरीराच्या इतर पेशी) या आनुवंशिकतेचे गुण वाहत नाहीत तर 'जर्म सेल्स'च (म्हणजे बीजांड आणि शुक्रजंतू (गॅमेट्स)) आनुवंशिकतेचे गुण वाहतात असं त्यानं दाखवून दिलं आणि 'पॅन्जेनेसिस'ची कल्पना खोडून काढली.

याबद्दलची आणखी एक संकल्पना म्हणजे पृथ्वीवर अस्तित्वात असलेला प्रत्येक जीव हा आधीच कोणत्यातरी 'जर्म सेल'मध्ये अगदी सूक्ष्म पण पूर्ण स्वरूपात अस्तित्वात असतो.या सूक्ष्मजीवाला 'होमोक्युल्स' म्हणत.मातेच्या गर्भात आल्यावर या होमोक्युल्सचा फक्त आकार तेवढा वाढतो. आणि जन्माच्या वेळी त्या सजीवाचं पूर्ण वाढ झालेलं अर्भक मातेच्या गर्भातून बाहेर येतं,असं ही थिअरी सांगत होती.

अपुर्ण राहिलेला भाग पुढील भागामध्ये…

7/17/26

पऱ्यांचा परिसर / Precincts of fairies.

एकदा महर्षी टॉलस्टॉयनं मॅक्सिम गॉर्कीला विचारलं, "तुला हॅन्स अँडरसनच्या परीकथा आवडतात काय ?" नंतर विचारमग्न होऊन तो म्हणाला,

"परीकथांचे रशियन भाषांतर मी वाचलं होतं.नंतर दहा वर्षांनी ते पुन्हा वाचून काढलं.अन् मला जाणीव झाली की हॅन्स अँडरसन जीवनात किती एकटा होता.अगदी एकटा.तो भटक्या होता आणि म्हणूनच एकटा होता."

हॅन्स अँडरसनच्या बापानं त्याला समजावून घेतलं.पण त्याच्या मरणानंतर तो आई असूनही पोरका झाला. इथूनच त्याच्या परिकथेतल्या जीवनाला सुरुवात होते. निराधार हॅन्स एकटाच नशीब शोधायला ह्या उघड्या जगात निघाला.तो म्हणायचा,'दुष्ट पऱ्यांनी मला निराधार,निराश्रय केलं.'पण त्यांनीच त्याला राजवाड्यात नेलं.डेन्मार्कचा राजा फ्रेडरिक याच्या आश्रयाला तो राहिला.तिथं त्यानं मन लावून अध्ययन केलं.साऱ्या युरोपभर त्यानं प्रवास केला.वन,प्राणी आणि पक्षी यांच्या जगात तो रमला.

स्वतःभोवती त्यानं एक आगळंवेगळं पऱ्यांचं जग निर्माण केलं.तो जगद्विख्यात परिकथाकार झाला.जगातला तो पहिला परीकथाकार. अन् आयुष्याच्या शेवटी म्हणाला,'चांगल्या पऱ्यांनी माझं जीवन आनंददायी केलं.माझ्या हातून परीकथा लिहून घेतल्या.'

मला नेहमी वाटे,खरंच पऱ्यांचं खरंखुरं जग असावं काय ? माझं सारं आयुष्य जंगलात गेलेलं.पण मी चुकूनही कधी हाती बंदूक धरली नाही.शिकाऱ्याच्या बंदुकीला जंगली जनावरं तर बळी पडतातच;पण आपल्याला न दिसणारी छोटीछोटी माणसंही हकनाक बळी पडत असावीत.मला आठवतं ते परीचं गाणं-

'Up the airy mountain

Down the rushy glen,

We daren't go a-hunting,

For fear of little men.'

नवेगाव-बांधावरील माझ्या निवासस्थानी माझी मुलगी छाया कित्येकदा घरासमोरच्या आवळीच्या झाडाखाली तासन्तास एकटीच खेळत असे.कित्येकदा स्वतःशीच तिची गुणगुण वा बोलणं चाले.दुर्दैवानं तिच्या वयाचे सोबती-सवंगडी तिला जंगलात कधी बरोबर खेळायला मिळालेच नाहीत.मी तिला एकदा सहज विचारलं, "अगं,तू कुणाशी बोलत असतेस ? तुला वेड तर लागलं नाही ?"ती हसतबागडत म्हणाली, "कुणाशी म्हणजे ? पऱ्यांशी बोलते.

आपल्या घरामागच्या उंच पहाडातल्या जंगलातून त्या रोज माझ्याबरोबर खेळायला येतात.कधी झाडावरची बोरं,तर कधी एरुण्या,तर कधी करवंदं तोडायला त्या मला मदत करतात.त्यांना आपल्या मोराच्या पिलांशी खेळायला फार आवडतं."

"असं काय ! कशा दिसतात त्या?"

"हॅन्स अँडरसनच्या परीकथेतल्या पऱ्यांसारख्या."

त्यावेळी छाया चौथीत होती.तिच्या वाढदिवशी मी हॅन्स अँडरसनच्या परीकथेचा संच तिला भेट दिला होता.ती मन लावून अभ्यास करी.पण जंगलात तिच्या शिक्षणाची आबाळ झाली.

पाठीला पुस्तकांचं न पेलवणारं ओझं टांगून भुरुभुरु हवेत केस उडत असलेली चिमुरडी छाया जंगलातल्या वाटेनं शाळेतून दोनतीन किलोमीटरचं अंतर चालत येत असल्याचं दृश्य मी अजूनही विसरलो नाही.लहान मुलं खोटं बोलत नाहीत.असं असलं तरी मला हे सारे तिच्या मनाचे खेळ असावेत असं वाटलं.ती गोष्ट नंतर मी पार विसरून गेलो.छायाचं एकटीनं खेळणं चालूच होतं.

नंतर काही वर्षांनी यॉर्कशायर इथल्या दोघी बहिणींची एक सत्यकथा वाचली.१९२० साली 'स्ट्रेंड' ह्या ख्यातनाम इंग्रजी मासिकात पहिल्यांदा पऱ्यांचे फोटो प्रसिद्ध करण्यात आले.१९१७ च्या वसंत ऋतूत एल्सी आणि फ्रान्सिस ग्रिफिथ या अनुक्रमे सोळा व दहा वर्षांच्या मुलींनी पऱ्यांबरोबर मैत्री जोडली. त्या त्यांच्याबरोबर कॉटिंगलेतल्या घरामागच्या अरुंद दरीत

खेळत.नवीन सवंगड्यांविषयी त्या दोघींनी आपल्या आई-वडिलांना सांगितलं.पण त्यांनी त्या मुलींवर विश्वास ठेवला नाही.एल्सीनं वडिलांचा कॅमेरा घेतला, अन् चक्क आपल्याबरोबर खेळणाऱ्या बागडणाऱ्या पऱ्यांचे फोटो खेचले.ते 'स्ट्रेंड'मध्ये प्रसिद्ध करण्यात आले.लोकांचा त्यावर विश्वास बसेना.अनेक निष्णात छायाचित्रकारांनी ती छायाचित्रं आणि निगेटिव्हज तपासले.त्यात कुठलाही तांत्रिक दोष नव्हता.परंतु पऱ्या या जगात अस्तित्वात नसताना ही छायाचित्रं मिळाली कशी,याचं कोडं काही उलगडेना.

यात काहीतरी लबाडी आहे असं अनेक जिज्ञासूंना वाटू लागलं.

शेवटी प्रख्यात गुप्त पोलीस अधिकारी सर आर्थर कॉनन डॉयल याची या प्रकरणी चौकशी करण्याकरिता नेमणूक करण्यात आली.त्यानं दुसरा कॅमेरा घेतला.फोटोग्राफी-प्लेटवर ओळखणीसाठी खुणा केल्या,आणि त्या कॅमेऱ्यानं पऱ्यांचे फोटो काढण्यासाठी एल्सीला सूचना दिल्या. एल्सीनं पुन्हा पऱ्यांचे फोटो घेतले आणि डॉयलला दाखवले.त्यानं पाहिलं-पायांत लहान बूट,डोक्यावर निमुळती टोपी व पंख असलेल्या पारंपरिक पऱ्या त्यात दिसत होत्या.डॉयलला आश्चर्याचा धक्का बसला.या अभूतपूर्व घटनेवर त्यानं 'कमिंग ऑफ फेअरीज' हा ग्रंथ लिहिला.त्यात तो शेवटी म्हणतो,"या धरित्रीवर आपल्यासारखंच पऱ्यांचं एक जग अस्तित्वात आहे हे सिद्ध करता आलं तर आपल्या मनाची काय अवस्था होईल हे सांगणं कठीण.हे स्वायत्त जग अद्भुत असं आयुष्य जगतं;आणि आश्चर्य हे की वातावरणाच्या लहरीतील काही फरकानं ते आपल्यापासून वेगळं झालेलं आहे."

तुम्ही कधी नवेगाव-बांधला पहिल्यांदा गेलात की तळ्याकाठी मासे पकडणारा एखादा धीवर तुम्हाला एक गोष्ट ऐकवील.ती ऐकण्याची इच्छा असो वा नसो.

"बरं का सायब,”डोंगरावरच्या उंच शिखराकडे पाहात तो सांगेल,"हे मोठं तळं कोलदेवानं बांधलं.त्याला सात बहिणी होत्या."अन् लहान बांधाकडे बोट दाखवून म्हणेल,"ती पार पाहिलीत ? सात बहिणींनी ती बांधलीय.म्हणून तिला सात बहिणींची पार म्हणतात. त्या चिरंजीव आहेत.ह्या तळ्याचं अन् इथल्या जंगलाचं त्या संरक्षण करीत रात्रंदिवस फिरत असतात."

सात बहिणींच्या पारीवर उभं राहिलं की पाठीमागं सुंदर अद्भुतरम्य झिलाण आहे अन् पुढं खोलखोल अफाट पसरलेलं पाणी.तो धीवर पुढं म्हणेल,

"साब,इथं सोन्याची नथ ल्यालेली जलपरी आहे.ज्या धीवराच्या जाळ्यात ही परी सापडेल,त्याचं भाग्य उदयाला येईल."

ऐकणारा प्रवासी हे सारं जिज्ञासेनं,कुतूहलानं ऐकत असला,तरी त्याला ते खरं वाटत नाही.तरी पण ह्या तळ्याकाठी राहणारे धीवर हे सारं खरं समजून शतकानुशतकं लोकांना कथा सांगत असतात.

मला मात्र ते खरं वाटतं.इथल्या झिलाणीकाठच्या उंच दरडीवरच्या शिळांवर दिवसा,रात्री अन् पहाटे तासन्तास एकटा बसून मी पक्षिनिरीक्षण केलंय.इथंच मला परमेश्वररूपी सुंदर पक्ष्यांचं गूढ कळलं आहे.हा परिसर देवराई म्हणून अजूनही अस्पर्श आहे.निर्वंश होण्याच्या भीतीनं माणसाच्या कुऱ्हाडी इथपर्यंत अजून तरी पोहोचलेल्या नाहीत.

दरेकसाजवळच्या दलदलीकाठचा दल्लू गोंड तर अहोरात्र परीसाच्या चिंतनात असायचा.तिथल्या गूढ दलदलीभोवती फिरणाऱ्या परीसाच्या मागोमाग जायचा.त्याला तिथं अप्सरा दिसायच्या.सदान्कदा देवलोकात मग्न असलेला दल्लू एखाद्या जांभळीच्या सावलीत निभ्रांतपणे बसलेला दिसायचा.मी भेटलो की सौम्य स्मित करायचा.

गॅव्हिन मॅक्सवेलचा 'रिंग ऑफ ब्राइट वॉटर' हा हुदाळ्याविषयीचा ग्रंथ जगप्रसिद्ध आहे. हुदाळ्याच्या निरीक्षणाच्या व अभ्यासाच्या निमित्तानं तो समुद्रकाठच्या अतिदूर गावातल्या मोठमोठ्या,भव्य व उजाड निवासस्थानात एकटाच वर्षानुवर्षं राहिलाय. समुद्रकिनारी राहणाऱ्या कोळ्यांकडून त्यानं पऱ्यांविषयी ऐकलंय.बरंच काही त्यानं पाहिलं आहे आणि अनुभवलं आहे. 'रॅव्हन सीक द ब्रदर' ह्या ग्रंथात तो लिहितो,

"सायंकाळी लावलेलं जाळं काढण्यासाठी एकदा एक कोळी पहाटेच्या काळोखात समुद्रावर गेला.तिथं अंधार कधीच नसतो.

स्वयंभू प्रकाशानं सारा परिसर उजळला होता.त्यानं जाळं काढायला सुरुवात केली,तेव्हा नेहमीपेक्षा ते जड वाटलं.एखादी मोठी मासोळी सापडली असावी ह्या आनंदातच त्यानं आपलं जाळं ओढतओढत काठावर आणलं.पाण्याबाहेर काढलं. पाचसहा फूट लांबीची ही मासोळी नेहमीपेक्षा वेगळीच दिसत होती.त्या कोळ्यानं अगदी जवळून पाहिलं. कमरेपासून वर ती तरुण स्त्री होती;तर तिला खाली माशाचं शेपूट होतं.मातीशी नातं असलेला कोळी कधी भित्रा नसतो.त्यानं त्या स्त्रीला उचलून घरी आणलं.

घरी येताच तिची शेपटी गळून पडली आणि समोर एक सुंदर युवती उभी राहिली.तिची गळालेली शेपटी त्यानं अडगळीच्या खोलीत सांभाळून ठेवली.तिनं त्यानंतर त्याच्याबरोबर अनेक वर्षं सुखानं संसार केला.तिला मुलं झाली.पण एकदा त्या मुलांपैकी एकजण खेळत-खेळत अडगळीच्या खोलीत गेला असता त्याचा पाय चुकून त्या शेपटीवर पडला.आईकडे जाऊन त्यानं तिला विचारलं, 'आई,ती घरातली माशाची शेपटी ग कसली ?'

'अरेच्या ! ती तर माझी शेपटी !' जलपरी आनंदित होऊन मोठ्यानं म्हणाली,'माझी फार फार दिवसांपूर्वी हरवलेली शेपटी ! कशी मी विसरले कोण जाणे!'

आणि ती एकदासुद्धा मागं वळून न पाहता थेट समुद्राकडे निघाली.

त्यानंतर ती पुन्हा कधीही दिसली नाही!" हे झालं फार फार पूर्वीचं.त्या वेळी अस्पर्श्य वनं होती.गावानजीकच्या देवराई देवळाइतक्याच पवित्र होत्या.तळ्यामध्ये कमळं फुलत.तिथं पक्षिकुळं आश्रयाला येत.शहराजवळ सुंदर उद्यानं होती.नद्या संथ वाहत.त्यांच्या काठची झाडं आपलं पाण्यात पडलेलं स्वच्छ प्रतिबिंब पाहून हवेत आनंदानं डोलत.समुद्राच्या गाजेचा नादलुब्ध आवाज सुरू वृक्षाच्या पानापानांतून पाझरत कानी यायचा.खाडीला अद्भुतरम्य, गूढ खाजनीच्या जंगलांची हिरवीगार निःस्तब्ध किनार होती. वृक्षांना माणसं मानणारे आदिवासी जंगलात होते.

अन् गेल्या तीन-चार दशकांत हे सारं नष्ट होत चाललंय. जंगलं कमी होताहेत.देवराईचा कोळसा होतोय.खाडी सुकल्यामुळं तिच्या काठची जंगलं नाहीशी होताहेत. कारखान्यातलं दूषित पाणी नदीतून समुद्राला मिळत आहे.तळ्यातील पाण्याचा उपसा होतोय.सरोवरं आटत चाललीत.आभाळ आणि पाताळ कुणाच्या मालकीचं आहे ? ते देखील रेडिओ-अ‍ॅक्टिव्हसारख्या प्राणघातक किरणांनी दूषित झालेलं आहे.हे सारं उद्ध्वस्त होत असताना कितीजण व्यथित होत असतील ? पण ही सारी व्यथा एका स्त्रीनं 'सायलंट स्प्रिंग' या ग्रंथात मोठ्या प्रभावीपणं व्यक्त केली आहे.तिचं नाव रॅचेल कर्सन. ह्या ग्रंथानं साऱ्या जगाला परिसराविषयी विचार करायला लावलं.अन् अखेर परिसर-संरक्षणशास्त्राचा जन्म झाला.

जंगलाचं देणं,मारुती चितमपल्ली,साहित्य प्रसार केंद्र,सिताबर्डी,नागपूर.

पण हे सारं गेलेलं वैभव परत मिळणार काय ? लाभेलही कदाचित.पण त्याला भगीरथ प्रयत्न हवेत. भस्मासुराची गोष्ट आपल्याला माहीत आहे.त्याचं वरदानच शेवटी त्याला शाप ठरलं आणि तो नष्ट झाला.'परिसर' या शब्दाची व्युत्पत्ती व्याकरणकार काहीही करोत,पण मला वाटतं,पऱ्यांचा सर तो परिसर.ह्या पऱ्यांना वाचवा,म्हणजे सारा परिसर आपोआपच वाचेल !.

समाप्त