'हे जग कसे चालते,याचे प्रचंड कुतूहल नसेल,तर तुम्ही मेंदूचा वापर करीत नाही.आणि ते जग बदलून नव्याने सुंदर जग घडवण्याची आकांक्षा नसेल,तर माणूस म्हणवून घेण्याची लायकी नाही.' काही वर्षांपूर्वी अशा आशयाचे विचार जगभर ऐकायला मिळत.जगाचा इतिहास असो वा अर्थकारण,समाजमन असो वा आधुनिक तंत्रज्ञान,प्रत्येक क्षेत्रातील बदल समजले नाहीत,तर वैयक्तिक अपमान समजला जात असे.
जग समजून घेण्याचे बौद्धिक आव्हान आणि जग बदलण्याची स्फूर्ती हाच जगण्याचा गाभा होता. वैयक्तिक आणि सामूहिक जीवन सुधारणे हीच विषयपत्रिका होती.विख्यात इतिहासकार एरिक हॉब्जबॉम यांनी विसाव्या शतकातील १९१४ ते १९९१ ह्या काळाला 'अतिरेकाचा काळ' (द एज ऑफ एक्स्ट्रीम्स) म्हटले आहे.साम्यवाद, भांडवलशाही,फॅसिझम या विचारसरणींच्या धुमश्चक्रीचा हा काळ होता.१९९१ नंतरच्या काळाला 'आदर्शवादाचा अंत झालेला काळ' संबोधले जाते.
नंदन निलेकणी इमॅजनिंग इंडिया - आयडियाज फॉर द न्यू सेंच्युरी,पेंग्विन पब्लिशिंग ग्रुप,बदल घडवणार कोण?
ग्रंथाचिया द्वारी-अतुल देऊळगावकर,विश्वकर्मा पब्लिकेशन.
आता लंबक दुसऱ्या टोकाला गेला. मी,मी आणि केवळ मीच ! 'मी माझ्या भौतिक परिस्थितीमध्ये बदल घडवणार.' हा अग्रक्रम झाला.फक्त स्वतःकडेच लक्ष पुरवताना आजूबाजूला अजिबात न पाहण्याचा वसा सर्वत्र पसरला गेला.संपत्तीची निर्मिती वाढत चालली, त्याचसोबत भुकेले व अर्धपोट वाढू लागले.संधीच्या विषमतेने अवघे जग ग्रासून गेले.
एकीकडे आर्थिक महामंदी व हवामानबदलासारखी महाकाय संकटे,तर त्याच वेळी पिण्यासाठी पाणी नाही, शिकायला शाळा नाही,उपचारांसाठी दवाखाना नाही, अशा स्थूल आणि सूक्ष्म आव्हानांचा एकाच वेळी सामना करताना सामान्य माणसाचे पेकाट मोडून गेले. 'कुठेही,कुठलाही बदल कधीही शक्य नाही' याची खूणगाठ सामान्य माणसाने बांधून घेतली.जगाचे भविष्य अंधकारमय वाटत असताना सर्व पातळ्यांवर बदल घडवता येतील,ही उमेद बराक ओबामा' यांनी दिली.जग बदलण्याचा मुद्दा हा सदासर्वकाळ कळीचा असतो (आणि असणार आहे), हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
मध्यमवर्गीय घरात जन्म घेतलेल्या प्रत्येकाची अमेरिकेतील आय.टी.क्षेत्रात अधिकारी होण्याची महत्त्वाकांक्षा असते,तिथे 'इन्फोसिस'चे मुख्य कार्यकारी अधिकारी नंदन निलेकणी कधीच पोहोचले होते.भारत सरकारकडून त्यांना 'पद्मभूषण' हा सन्मान बहाल झाला आहे. 'टाइम' साप्ताहिकाने जगातील शंभर प्रभावशाली व्यक्तींच्या यादीमध्ये त्यांचा समावेश केला आहे.'वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम'च्या' सल्लागार मंडळावर जगातील वीस उद्योजकांमध्ये त्यांची निवड झाली आहे.राजकीय, सामाजिक व औद्योगिक क्षेत्रात त्यांचा दबदबा आहे. दहा हजार कोटी रुपयांची उलढाल असलेल्या कंपनीचे ते प्रमुख आहेत.कॉर्पोरेट विश्वात 'इन्फोसिस'विषयी विलक्षण कुतूहल आहे.सामाजिक जबाबदारी (कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी) मानून नफ्यामधील मोठा वाटा समाजातील वंचितांच्या शिक्षणासाठी व आरोग्यासाठी खर्च केला जातो.वाहनचालकापासून शिपायापर्यंत सर्व जण 'इन्फोसिस'चे भागधारक असतात.'काम करणारे हे नोकर नसून, नफ्यामधील भागीदार आहेत' अशी वागणूक देणारे 'इन्फोसिस'चे संस्थापक नारायण मूर्ती वेळीच निवृत्त झाले आणि नात्यात नसणाऱ्या निलेकणींवर कारभार सोपवला.
—---------------------―――—---------------------
१. बराक ओबामा हे २००८ ते २०१६ या काळात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते.
२.'वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम' ही एक आंतरराष्ट्रीय बिगर शासकीय संस्था असून,दरवर्षी जागतिक मुद्द्यांवर दावोस येथे पाच दिवस परिषद भरवते.
३. उद्योगांचे सामाजिक उत्तरदायित्व (कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी) ही संकल्पना भारतात एप्रिल २०१४ मध्ये कंपनी कायद्यातील तरतुदीद्वारे स्थापित करण्यात आली.त्यानुसार,उद्योगांना नफ्यातील दोन टक्के हिस्सा सामाजिक कार्यासाठी खर्च करण्याचे बंधन घालण्यात आले आहे.
—-------–--------------------------------------------
त्या वेळी नव-सरंजामीमध्ये रुतलेला कॉर्पोरेट जगाचा गाडा लोकशाहीकडे वळवल्याबद्दल सर्व थरांतून त्यांचे स्वागत झाले.'इन्फोसिस'मध्ये जावे हे देशातील कुठल्याही इंजिनियरचे स्वप्न आहे.मूर्ती व निलेकणी हे तरुण पिढीचे 'आयकॉन्स आहेत. 'टाटा' पाठोपाठ 'इन्फोसिस'ने विश्वासार्हता प्राप्त केली आहे.
लौकिकार्थाने निलेकणी यांना सर्व काही मिळाले आहे. सत्तेच्या वर्तुळाच्या निकट असण्यामुळे ठिकठिकाणी स्थावर मालमत्ता मिळवणे,स्वतःसाठी अनेक योजना 'तयार' करून घेणे,राज्यसभेची जागा पदरात पाडून घेणे,अशी कित्येक 'विकासकामे' त्यांना सहज शक्य झाली असती;परंतु नंदन निलेकणी यांची मूस वेगळी आहे.इतिहासकार व विचारवंत रामचंद्र गुहा ('इंडिया अफ्टर गांधी'चे लेखक),सुनील खिलनानी ('आयडिया ऑफ इंडिया'चे लेखक) हे त्यांचे खास मित्र आहेत. 'जागतिकीकरणाच्या काळात तंत्रज्ञानामुळे सर्वांना विकासाची समान संधी आहे' हे गप्पांच्या ओघात निलेकणी सहज सांगून जातात. त्यावरून 'वर्ल्ड इज फ्लॅट- ए ब्रीफ हिस्ट्री ऑफ द ग्लोबलाइज्ड वर्ल्ड' हा पुलित्झर विजेता ग्रंथ लिहिण्यास थॉमस फ्रिडमन हे निलकेणी यांच्यामुळे प्रवृत्त होतात,हे समजते.
यावरून निलेकणी यांना लाभलेल्या दृष्टीचा काहीसा अदमास लागेल.आधी नेहरू आणि पुढे आय.आय.टी.मुळे निलेकणींचे विचार घडत गेले. १९७० च्या दशकात देशातील अभियांत्रिकी व वैद्यकीय महाविद्यालये हे बदल घडवण्याचे अड्डे होते.सर्व आय.आय.टी.मध्ये कार्ल मार्क्स,माओ,गांधी,लोहिया यांचाही अभ्यास सुरू असे.साहित्य,चित्रपट,नाटक यांमधील नवीन प्रयोग करणारे कलावंत आवर्जून आय.आय.टी.मधील बुद्धिमंतांशी संवाद साधण्यास उत्सुक असत.या वातावरणात निलेकणी यांनी चतुरस्र व सखोल वाचन केले.ते विचाराने डावे नसले,तरी केवळ धनसंचय करीत जावे हा विचार त्यांना कधीच शिवला नाही.आपण समाजाचे देणे लागतो,ही भावना त्यांनी कधीच मागे पडू दिली नाही.शेती क्रांती,औद्योगिक क्रांती व माहिती क्रांतीमुळे जग कसे बदलले हे त्यांना माहीत आहे.तिन्ही काळांत संपत्तीची निर्मिती कशी करायची,हा वंचितांना भेडसावणारा प्रश्न राहिला आहे.यापुढील बदल घडवण्यासाठी तंत्रज्ञान हे कळीची भूमिका बजावू शकते,याची त्यांना खात्री आहे;परंतु बदलाची प्रक्रिया गतिमान व तसेच व्यापक करण्यासाठी राजकारण कळीचे आहे,याचे त्यांना भान आहे.म्हणूनच 'इमॅजनिंग इंडिया आयडियाज फॉर द न्यू सेंच्युरी' ह्या ग्रंथात नंदन निलेकणी यांनी समाजातील प्रत्येकासाठी नवी स्वप्ने आणि ती साकार करण्यासाठीचा आराखडा सादर केला आहे (सहसा उद्योगपती आत्मकथन,यशकथा सांगतात किंवा व्यवस्थापनाचे डोस पाजतात).
जवाहरलाल नेहरू हा रामचंद्र गुहा,सुनील खिलनानी व निलेकणी यांच्या विचारातील समान धागा आहे. नेहरूंना नाकारण्याच्या फॅशनला प्रतिष्ठा मिळालेली असताना हे तिघेही नेहरूंच्या आधीचा व नंतरचा भारत समजावून सांगतात.मध्ययुगीन अवघड देश चालवण्याचे शिवधनुष्य नेहरूंनी लीलया पेलले.भाषा,धर्म,जात व वर्ग यांनी भारतीय समाज विखंडित झाला होता. नेहरूंनी अर्थ व राजकारणातून भारताचा सांधा मजबूत केला.
लोकशाहीची प्रक्रिया रुजवली.त्या काळात देश अखंड राहील काय,अशी शंका अनेकांना होती.अखंड भारताविषयी नेहरूंना दृढ विश्वास होता. वैज्ञानिक, तंत्रज्ञ,अर्थतज्ज्ञ,लेखक,कलावंत अशा सर्व पातळ्यांवरील लोकांचे नेहरू हे स्फूर्तिस्थान होते. मतभेदांना सांधण्याची हातोटी आणि आदर्शवादाला कणखर इच्छाशक्तीची जोड देऊन नेहरूंनी आधुनिक भारताचा पाया रचला.लोकशाही जोपासणाऱ्या तिन्ही खांबांची उभारणी केली.नवता व परंपरा,पौर्वात्य व पाश्चात्त्य विचार यांचा अप्रतिम संगम घडवण्यासाठी अनेक संस्थांची स्थापना केली.हा इतिहास नाकारून पुढे जाता येणार नाही.उलट,आज नवा भारत घडवताना नेहरूंच्या दूरदृष्टीची प्रचिती येते,हे निलेकणी यांनी साधार दाखवून दिले आहे.सध्या शिक्षणव्यवस्था हितसंबंध जपणाऱ्यांच्या ताब्यात आहे.तेथील निर्णयप्रक्रियाच सदोष आहे.शिक्षणाचे महत्त्व सांगण्याची आता गरज नाही.शाळा व महाविद्यालयांची संख्या खूपच तोकडी आहे.संधीच कमी आहे.ही संधी आरक्षणामुळे हिरावून घेतल्याची भावना व त्यातून ताण निर्माण होतो.उत्तम शिक्षणाची विपुल प्रमाणात संधी उपलब्ध करून देणे असंभव नाही.शिक्षकांचा प्रशिक्षण खर्च वाढवला पाहिजे. त्याकरिता गुंतवणूक वाढणे आवश्यक आहे.खाजगी संस्थांचा सहभाग वाढवणे अनिवार्य आहे.कोणत्याही क्षेत्रात खाजगी गुंतवणूक टाळून चालणार नाही.सर्व काही राज्याने (स्टेट) केले पाहिजे आणि बाजारपेठेवर सगळे सोपवा,ही दोन्ही टोके उपयोगाची नाहीत.राज्य व बाजार यांच्यातील संतुलन साधण्याची किमया नेहरूंना साधली होती.आपल्याला ही प्रक्रिया अधिक कार्यक्षम करावी लागेल,असे निलेकणी म्हणतात.
महत्त्वाचे बदल करण्यासाठी मोकळेपणाने संवादाची निकड आहे;परंतु आपला समाज आजही जात,धर्म, भाषा यांच्यातून बाहेर पडत नाही.सेवाभावी संस्था, औद्योगिक जग व प्रसारमाध्यमं यांच्यात सुसंवाद नाही. एके काळी समाज कसा घडवावा? न्याय यंत्रणा कशी असावी? अशा मूलभूत प्रश्नांवर प्रदीर्घ वाद-संवाद होत असत.ह्या चर्चा आता लोप पावणे हे आपल्यासाठी घातक आहे.सगळे आपापल्या कोशात असतात. आपला देश असंघटित कामगारांनी खचाखच भरलेला आहे.तो तसाच राहावा,संघटित होऊन फायदे घेऊ नयेत,अशीच मोठ्या उद्योगांची इच्छा असते. 'गुन्हेगार व राजकारण्यांचे अभयारण्य' असे असंघटित कामगारांचे स्वरूप आहे.कामगार कायदे व नियम यांच्यात तातडीने सुधारणा गरजेची आहे.कित्येक कायदे कालबाह्य व अर्थशून्य झाले आहेत.त्यांना कायमचा निरोप दिला पाहिजे.सोपे व सुलभ नियम नसण्याची फळे किती काळ भोगणार? कामगारांची संख्या त्या त्या उद्योगाला ठरवू द्या.किचकट कायद्यांमुळे भरपूर मनुष्यबळ उपलब्ध असूनही कंपन्या कामगारांची बचत करणाऱ्या यंत्रणा राबवतात.या विषयावर गांभीर्याने कुठे चर्चा होते, असा सवाल निलेकणी करतात.
आपला विकास सर्वंकष नसून विखुरलेला आहे.समग्र विकासाकरिता तसे आर्थिक व राजकीय धोरण करावे लागेल.
त्यानंतर आरोग्य,पर्यावरण,ऊर्जा,सामाजिक सुरक्षा आणि तंत्रज्ञानाकडे वेगळ्या दृष्टीने पाहण्याचा आग्रह निलेकणी करतात.त्यातूनच आपल्याला खुलेपणा,पारदर्शकता व लोकशाही मानणारा समाज घडवता येईल.आकसत जाणारी शेती आर्थिकदृष्ट्या टिकणारच नाही.छोट्या शेतकऱ्यांनी एकत्र येऊन शेती करणे भाग आहे.शेतीमध्ये गुंतवणूक वाढवण्याकरिता कॉर्पोरट क्षेत्राला मुभा द्यावी.जमिनीचा ताबा शेतकऱ्यांकडेच राहू द्यावा.शेती व्यवस्थापन व नवीन तंत्रज्ञान यांमुळे शेतीमध्ये सुधारणा होईल.शेतकऱ्यांना त्यांचा माल कुठेही विकण्याची सोय असली पाहिजे. नाहीतर त्याला बाजाराचा फायदा कधीच मिळणार नाही.दलित व आदिवासींकरिता अनेक योजना व अब्जावधी रुपये खर्ची पडतात.शिक्षण व बाजारपेठेत पोहोचण्याची सुविधा निर्माण केली,तर त्यांना मोठ्या संधी मिळू शकतील.शहरीकरणामुळे त्यांना निवडीचे स्वातंत्र्य लाभेल.यातूनच समाजातील दुर्बल घटकांना सामाजिक सुरक्षा मिळू शकेल.नाहीतर लोकशाहीला अर्थच नाही.
जगातील महत्त्वाच्या घडामोडींकडे निलेकणी यांचे बारकाईने लक्ष असते.'दहशतवाद आणि हवामान बदल यांमुळे अवघे जग कडेलोटाच्या टोकावर उभे आहे,' असे विख्यात भौतिकशास्त्रज्ञ सर मार्टिन रीझ यांचे प्रतिपादन आहे. (संदर्भ'आवर फायनल आवर') जग वाचण्याची शक्यता ५० टक्केच आहे.
हे सांगून निलेकणी म्हणतात, 'वैयक्तिक आयुष्यात सुधारणा घडवताना त्याचा पृथ्वीला भार होणार नाही याची दक्षता आपल्याला घ्यावी लागेल.'
'आपल्या देशात क्रांती नाही,उत्क्रांती होत असते,' असे मार्मिक भाष्य आचार्य विनोबा भावे यांनी केले होते. निलेकणी यांचा ग्रंथ वाचताना त्याची आठवण येते.
आपल्या देशात बदल होतोय.आता रथयात्रा काढली, तर किंचितही प्रतिसाद मिळणार नाही.लोकांना उत्तम प्रशासन हवे आहे.ही भावना मतपेटीतून व्यक्त होत आहे.धर्म,जात,भाषा यांवर तयार केलेली झुंड फार काळ टिकू शकत नाही.जनतेला शांतता व समृद्धी हवी आहे,याची खबर राजकीय,सामजिक,आर्थिक क्षेत्रातील धुरिणांना नाही;कारण त्यांची समाजापासून फारकत झालेली आहे.
भारताला उन्नत करण्याचे टागोर,गांधी,नेहरू यांचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी हा काळ अनुकुल आहे,यावर नंदन निलेकणी यांचा गाढ विश्वास आहे.'इन्फोसिस'च्या साम्राज्याचा विस्तार करण्यापेक्षा देशाचे मूलभूत काम करण्याला ते प्राथमिकता देतात.कोटीकोटींची उड्डाणे बाजूला सारणे हे येरागबाळ्याचे काम नाही.तिथे विचारांचे अधिष्ठान लागते.आपल्या कृतीतून निलेकणी यांनी लाखो तरुणांच्या मनात भारत बदलणे शक्य आहे, ही भावना निर्माण केली आहे.
समाप्त…
"बदल कुणीतरी करेल, या भ्रमात राहू नका. कारण तो 'कुणीतरी' आपणच आहोत."