बापू म्हणाले,"सरकार,माझं बोलणं पूर्ण तरी करू द्या. लक्ष्मी नावाची गाय आपल्याकडे येऊ घातलीय.काल संध्याकाळी नेहमीप्रमाणे अंगणगाव रोडला चालायला गेलो होतो.बऱ्याच दिवसांनी केशवराव पटेल बरोबर होते.आठ फर्लांग चालत जायचं म्हणजे बऱ्याच गप्पा होतात.केशवरावांचा मोठा कारभार आहे.गोधनदेखील खूप आहे.ते म्हणत होते,ह्या वर्षी चांगल्या कुटुंबांत पाच गायी द्यायचं त्यांच्या मनात आहे.त्यांनी विचारलं, 'बापूसाहेब,एक लक्ष्मी नावाची सवत्स धेनू आपली हरकत नसेल तर आपल्याला द्यावी असं मनात आहे.' मी म्हटलं,विचार करून उद्यापर्यंत सांगतो.आज संध्याकाळी ते भेटतील तर काय सांगू त्यांना ?"
माई क्षणभर विचार करून म्हणाल्या,"सवत्स धेनू स्वतःहून येतीय.तिला करंट्यासारखं नाही कसं म्हणायचं? थोडं काम वाढेल.गवताचा खर्चही वाढेल पण तेवढाच दुधाचा खर्चही कमी होईल."
तर अशा रीतीने लक्ष्मीचा वाड्यात प्रवेश झाला.ती येण्याच्या आधी मागच्या अंगणात आड,मोरीचा चौक आणि संडास ह्यांच्या मधल्या जागेत भिंतीलगत दावणं बसवली गेली.लक्ष्मीला पाणी प्यायला म्हणून वापरात नसलेलं गंगाळं चिंच लावून घासून चांगलं चकचकीत केलं गेलं.लक्ष्मी उंच,सडसडीत,तांबड्या-पांढऱ्या रंगाची गाय होती.तिची डौलदार पण लांब शिंगं तिला छान शोभत होती.तिच्या वासराचं नाव पहिल्याच दिवशी यशाने 'नंद्या' ठेवलं.
हळूहळू लक्ष्मी वाड्यात रुळली.लक्ष्मीचं खाणंपिणं माईच बघत.घर आणि अंगण झाडण्यात आता मागचं अंगणपण वाढलं होतं.
घरातले अन् मागच्या अंगणातलं भाडेकरू असलेलं मारवाडी कुटुंब त्या भागाला गोठा म्हणू लागलं.लक्ष्मीचं दूध काढायला,
सकाळ.- संध्याकाळ दामू यायचा.घरात दूध-दुभत्याची रेलचल व्हायला लागली.आठवड्यातले निम्मे दिवस आदल्या दिवशी मुद्दाम करून ठेवलेली बाजरीची भाकरी कुस्करून त्यावर गरम दूध हा नास्ता तिन्ही मुलांना आवडू लागला.सकाळचं.चहापाणी आटोपून माई व्यंकटेश स्तोत्र म्हणता म्हणता लक्ष्मीचा गोठा आवरत. त्यांचा बराच वेळ तिथे जाई.एकीकडे झाडताना,शेण गोळा करताना किंवा लक्ष्मीच्या पुढे गवत टाकताना व्यकंटेश स्तोत्र थांबवून माईच्या लक्ष्मीशी गप्पा चालत. त्याही इतक्या प्रेमाने की,कुणी नुसतं लांबून ऐकलं तर वाटावं,एखादी प्रेमळ स्त्री तिच्या लेकीशी बोलतेय. तिच्या पाठीवरून,अंगावरून हात फिरवता फिरवता माई म्हणत,"अगं,काल रात्रीचं खाणं तसंच पडलंय.भूक नव्हती का गं? वेळेवर खाल्लं पाहिजे बाई.केवढी सुकलीयस तू. लेकुरवाळीने खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष करून कसं चालेल?"
लक्ष्मी स्वभावाने थोडी हेकट नि तापट होती.कधी कधी ती माईंच्या बोलण्याला,अंगावरून मायेने हात फिरवण्याला चांगला प्रतिसाद देई तर कधी चक्क दुर्लक्ष करी.
एकदा तिचं काय बिघडलं,कोण जाणे! तिने माईंना अशी दुशी दिली की,भितळीवर आदळून माईंना चांगलंच खरचटलं.यशा आडाचं पाणी काढून आंघोळीसाठी बंबात भरत होता.धावत येऊन त्याने माईंना उठायला मदत केली आणि पळत बाहेर जाऊन बापूंची काठी आणली.माईंना काही समजायच्या आत त्याने लक्ष्मीला दोन सणसणीत रट्टे लगावले.ते पाहून माई कळवळल्या.
यशाला ओरडून थांबवलं.नंतर समजावत म्हणाल्या,
"अरे,मुकं जनावर ते.प्रतिकार करू शकत नाही म्हणून का मारायचं ? आणि तिने काही मुद्दाम नाही ढकललं रे. तिने मान हलवली त्याच वेळेला मी नेमकी मध्ये आले. हो की नाही ग लक्ष्मी ?"
तेवढ्यात लक्ष्मीने मान हलवली.माई म्हणाल्या,"बघ ! हो म्हणतेय."
यशा मुकाट्याने काठी ठेवायला ओसरीकडे गेला.
नाताळाची सुट्टी आठवड्यावर आली आणि बापूंच्या डोक्यात आलं,ही सुट्टी शेतावर घालवावी.माईंनी शंका काढली,
"अहो पण राह्यचं कुठे?"
बापूंचं नियोजन पक्कं असे.त्यांनी कानडेंना त्यांच्या शेतातलं घर पंधरा दिवसांसाठी रायला मागितलं. कानड्यांचं शेत बापूंच्या शेताला लागूनच होतं.शिवाय कानड्यांचं स्वतःचं असं उसाचं खूप मोठं क्षेत्र असल्याने त्यांच्या वावरातच गुऱ्हाळ लावलं होतं.ते दोन महिने चालणार होतं.मग काय! यशा-मंदा-मुक्ता खूश !
बापू म्हणाले "तुम्हा सगळ्यांची तयारी असेल तर आपण घरीच बाजरीची कणसं ताटापासून वेगळी करू, मळणीपण घरीच करू म्हणजे मजूरीचे पैसेही वाचतील. माईला घरातलं अन् स्वैपाकपाण्याचंही काम असल्याने उरलेल्या सगळ्यांनी दररोज एका पाचुंद्याचं कणीस तोडायचं."
नवीन अनुभव म्हणून सगळे आनंदाने कबूल झाले.
"बापू,पाचुंदा म्हणजे किती?" लहानग्या मुक्ताने विचारलं.
बापूंनी सांगितलं,"बाजरीची ताटं शेतातून कापली की, त्याच्या छोट्या छोट्या जुड्या एकत्र बांधतात.एकेका जुडीत सुमारे पंधरा ताटं असतात.अशा पाच जुड्यांचा एक पाचुंदा होतो."
यशाने मनातल्या मनात पंधराचा पाढा म्हटला आणि मुक्ताला म्हटलं,"म्हणजे मुक्ता,प्रत्येकाने पंचाहत्तर कणसं ताटांपासून वेगळी करायची !"
गावगोत,माधव सावरगांकर,अष्टगंध प्रकाशन
आपण कसा बरोबर हिशेब केला म्हणून त्याने शाबासकीच्या अपेक्षेने बापूंकडे पाहिलं.त्यांनीही 'बरोबर !' म्हणून मान हलवली.
एकदा जायचं म्हटल्यावर यशा-मंदा-मुक्ता ह्यांचं मनोराज्यम् सुरू झालं.माई आणि बापू न्यायच्या सामानाची लिस्ट बनवण्याच्या कामी लागले. मनोराज्यम् करता करता अचानक एक गोष्ट यशाच्या लक्षात आली.त्यामुळे तो धावतपळत ओसरीवर
माई-बापू बसले होते तिकडे आला आणि म्हणाला,
"बापू, आपण शेतावर पंधरा दिवस राहणार मग लक्ष्मी आणि नंद्याचं काय ?"
बापूंनी कौतुकाने त्याच्याकडे पाहिलं आणि ते हसून म्हणाले,
"यशवंतराव,तिथेही आपल्याला दूध लागणारच ना? तेव्हा लक्ष्मीला आणि नंद्याला आपण आपल्याबरोबरच न्यायचं.तिथे चाऱ्याचाही प्रश्न नाही. बाजरीचं पाचट आहेच शिवाय आप्पा कानड्यांच्या मळ्यात भरपूर हिरवा चारा मिळेल. लक्ष्मी आणि नंद्या पंधरा दिवसांत चांगले ताजे पडतील."
आणि मग शेतावर जाण्याचा तो दिवस उगवला.बापूंनी तातूकाकांची एक आणि आप्पा कानड्यांची एक अशा दोन बैलगाड्या मागवल्या.एका गाडीत पंधरा दिवसांसाठी माईंनी बरोबर घेतलेल्या शिध्याची गाठोडी, सगळ्यांचे कपडे असं मिळून मोठाच रमणा झाला होता.कारण भाजणी,मेतकूट,
साबुदाणा,पोहे... असे बरेच काही जिन्नस सगळ्यांनी आठवून आठवून सुचवले होते.त्याच समानाच्या गाडीत नंद्याला बांधून ठेवलं होतं. लक्ष्मीच्या गळ्यातलं चऱ्हाट त्याच गाडीच्या मागच्या बाजूच्या कडीला बांधलं.नंद्याच्या ओढीने ती चटचट पाय उचलील ही अटकळ होती.
दुसऱ्या गाडीत खाली पायऱ्यांवर जाड जाजम घातलं. शेतावरच्या मुक्कामासाठी अंथरुण-पांघरुणं लागणारच होती.तीच खाली टाकल्याने गाडीत चांगली गुबगुबीत बैठक तयार झाली होती.बापू आणि माई तिन्ही मुलांसह गाडीत बसले.एक तर दोनपैकी एक गाडी यायला उशीर झाला.गोठ्यातून मागच्या दरवाजाने बाहेर रस्त्यावर यायला लक्ष्मीने खूपच खळखळ केली.त्यामुळे गाड्या ढळायला साडेपाच वाजून गेले.चार कोसांचं अंतर तोडून रात्री आठ साडेआठपर्यंत मुक्कामी पोहचू हा निघतानाचा अंदाज होता.अर्थात थोडं इकडं तिकडं चालणार होतं.कारण रात्रीच्या जेवणासाठी माईंनी दशम्या आणि पीठ पेरून कांद्याची भाजी केली होती.
लक्ष्मीने सुरुवातीपासूनच नाठाळपणा करायला सुरुवात केली होती.ती फारच हटून बसली की,कुणीतरी गाडीतून उतरून तिला हाकलायचं,लक्ष्मीमुळे प्रवासाचा वेग खूपच मंदावला.अंधार पडू लागला.निम्मा रस्ता कसाबसा पार झाला पण आता अंधार गडद झाला होता.थंडीदेखील झोंबरी झाली होती आणि अचानक लक्ष्मीने बसकण मारली.काही केल्या ती उठेना.माई गाडीतून खाली उतरल्या.लक्ष्मीला थोपटून,आंजारून-गोंजारून त्यांनी उठवायचा प्रयत्न केला.पण लक्ष्मीचा असहकार काही संपेना.आता काय करावं,हा प्रश्न सगळ्यांच्याच पुढे पडला.
बरं,एका गाडीला अंधारात एकटं सोडणंसुद्धा शक्य नव्हतं.माईंच्या आधी बापूपण खाली उतरले होते. अंधारात आजूबाजूला पाहताना त्यांना लांबवर एकदोन मंद दिवे दिसले.त्यांनी गाडीवाल्याला विचारलं,
"श्रीपती,कुठल्या रे वस्तीचे दिवे आहेत हे?"
"धानोऱ्याची बेरडांची वस्ती हाये जी."
श्रीपतीचं उत्तर ऐकताच बापूंच्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या.रेव्हेन्यूमध्ये काम करताना त्यांना काही दिवस मॅजिस्ट्रेटची पॉवर होती,त्यावेळी धानोऱ्याच्या भिम्याची केस त्यांच्यासमोर आली होती.भीमा त्यावेळी त्या भागातला नामचीन दरोडेखोर होता.बापूंनी त्याला त्यावेळी सहानुभूतीने आणि माणुसकीने वागवलं होतं.
"श्रीपती,भिम्या आहे का रे अजून?"
"हाय की.पिकलाय आता,पन तब्येत तशीच कातळासारखी हाये.बस,तोंडावर थोड्या झुऱ्या पडल्याती." श्रीपतीने माहिती पुरवली.
त्यावर बापू म्हणाले,"श्रीपती,आम्ही इथेच थांबतो.तू गाडी सोड आणि वस्तीवर जाऊन भिम्याला सांग मी आलोय.
रस्त्यात आमच्या गायीने बसकण मारलीय."
श्रीपती बापूंच्या सांगण्याप्रमाणे निघाला.अर्ध्या तासाने श्रीपतीसोबत तीनचार जण येताना दिसले.भिम्याने आल्या आल्या बापूंच्या पाया पडून नमस्कार केला.
"देवा,आज माझं भाग्य उजाडलं.तुमचं पाय आमच्या वस्तीला लागले.इतक्या जवळ आलात.आता बिनघोर राहा.तुमची गाडी घेऊन तुम्ही म्होरं ढळा.मी येतो जनावराला घिऊन.शिरपती म्हनत व्हता कानड्याच्या वावरात पंश्वा दिस मुक्काम हाये म्हूनत पंध्रा दिस मी खळ्यात वस्तीला येईल.बाहेरच आळं करून पडल, वहिनीसाहेब आन पोरं बरोबर हायेत.काही दगा फटका होवाया नगं."
म्हाताऱ्या भिमाकडे बघत बापू मुद्दाम म्हणाले,"भिम्या, चारपाच जवान पोरं दांडकं घेऊन आले तर एकटा काय करशील रे?"
पांढऱ्या झालेल्या मिशांच्या झुबक्यांवर मूठ फिरवत भिम्या म्हणाला,"देवा,भिमा राखणीला हाय हे समजल्यावर कानड्याचं शिवारच काय,पण पंचक्रोशीतही कुनी फिरकायचं न्हाई."
बापू आणि माईंची गाडी निघेपर्यंत लक्ष्मीच्या पोटाखाली फळकुट घालून तिला उभी करण्याचे प्रयत्न सुरू झाले होते.
दुसऱ्या दिवशी माई सकाळी घराच्या बाहेर अंगणात आल्या तेव्हा लक्ष्मी नंद्याला चाटत उभी असलेली त्यांना दिसली.भिम्या 'रात्री परत येईन' असा निरोप ठेवून पहाटे अंधारातच आपल्या वस्तीवर गेला होता.पुढचे पंधरा दिवस मुलं पाखरांसारखी मुक्त फिरत होती. सकाळचा नास्ता झाला की,प्रत्येक जण एक पाचुंदा बाजरीची ताटं घेऊन विळ्याने कणसं वेगळी करत, हसतखेळत चुरशीने काम करत होता.अकराच्या सुमारास काम संपायचं.दोनशे फुटांवरच गुऱ्हाळाची काहील ठेवली होती.गूळ बनवतानाच्या आणि जाळाची भट्टी पेटती ठेवण्याच्या आवाजाने वातावरणात जाग होती.प्रत्येक वेळेला काहील उतरण्याच्या सुमारास तिन्ही मुलं उसाची टिपरी घेऊन वाट पाहत.काहील उतरल्यावर थोड्याच वेळात गुळावरती साय येई. त्याच्यावरून हातातली टिपर गोल गोल फिरवून ती साय नंतर थोडी थंड झाल्यावर खाण्यातला अवर्णनीय आनंद लुटताना त्यांना परमोच्च समाधान मिळे.
एक दिवस एका गुळ्याने एक एकदम वेगळाच पदार्थ सांगितला.गरम गुळात मुरमुरे-शेंगदाणे घालून केलेले लाडू चांगले तर लागतातच पण त्याच्या सांगण्यावरून बापूंनी त्याला खोबऱ्याच्या सातआठ वाट्या आणि स्टीलची तार आणून दिली.त्याने त्या वाट्या त्या तारेतून ओवून उसाच्या रसाबरोबर काहिलीत सोडल्या.उसाच्या रसाबरोबर त्या वाट्या काहिलीत गूळ तयार होईपर्यंत ठेवल्या.काहील उतरायच्या आधी त्या बाहेर काढल्या. त्याची चव मुलांनाच काय पण माई-बापूंनाही अवीट आणि अविस्मरणीय वाटली.
शेतावर राह्यला जाऊन आठ दिवस झाले होते.एकदा कणसं तोडत बसलेल्या यशाला बापूंनी लक्ष्मीला लिंबाच्या सावलीत बांधायला सांगितलं.यशा फुशारकीत उठला.लक्ष्मीचं दावं सोडून तिला तो लिंबाकडे घेऊन जायला लागला.आजूबाजूचं हिरवंगार गवत पाहून लक्ष्मी तिकडे जाऊ बघत होती आणि त्यामुळे यशा तिकडे ओढला जात होता.यशा जोर लावून तिला लिंबाकडे खेचत होता.शेवटी लक्ष्मीने यशाला डोक्याने उचललं आणि बाजूला फेकलं.यशा सातआठ फुटांवर फेकला गेला.माई, बापू, गुऱ्हाळात काम करणारी माणसं... सगळी धावली.ती येऊन पोहचेस्तोवर यशा अंगाला लागलेली माती झटकत उभासुद्धा राहिला. जवळ कणसं तोडायला,मदत करायला बसलेला श्रीपती म्हणाला,
"जनावर लै हुशार ! छोट्या मालकांना असं कोलवलं की,त्यांना शिंग लागू दिलं नै का इजा होऊ दिली नै."
राहिलेला भाग पुढील लेखामध्ये..