* विजय गायकवाड | Vijay Gaikawad

live

नमस्कार आपले स्वागत आहे. मी पुस्तके आणि मित्रांवर पैसे खर्च करतो,माझ्याकडे दगड आणि विटांवर खर्च करण्यासाठी पैसे नाहीत.- रस्किन बाँड.ही थोर माणसं व त्यांचे विचार मला पुस्तकात भेटलीत.ती भेटली आणि त्यांनी सांगितले कि, प्रत्येक दिवशी असं काही तरी करा की,ते तुम्हाला अधिक सुंदर उद्याच्या दिशेने खूप लांबवर घेऊन जाईल."- डोग फायरबाऊ.' सर्वियन कादंबरीकार मिलोराद पावीच यांचे एक वाक्य आहे ते म्हणतात - जोवर जगात पुस्तक वाचणाऱ्या वाचकांची संख्या बंदूकधारी सैनिका पेक्षा अधिक आहे तोवर काळजीच काहीच कारण नाही.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात.पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये.म्हणून अविरतपणे प्रयत्न करणारे मार्गदर्शक, मित्र धावून येतात.प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,डॉ.दीपक शेटे,आ.भरत बुटाले,प्रा.सर्जेराव राऊत,सुभाष ढगे,अनिल फारणे,डॉ.सुधीर सरवदे ,विश्वास खाडे, विनायक पाटील,संजय कुंभार,सतीश खाडे,मनोहर सुर्वे,गणेश खंदारे,तात्या गाडेकर, दादासाहेब गाडेकर, दादासाहेब ताजणे, पुस्तकातील घटना प्रसंग सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील यांनी केलेले आहे. मला लिहिण्याची प्रेरणा देणारी पुस्तके,लेखक,प्रकाशक,मित्र ही जगावेगळी माणसं माझ्या जीवनातील महत्वाचा टप्पा आहेत.... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ.मेघा गायकवाड, चिरंजीव मयान,माझ्या धावण्यातील गुरुवर्य नामदेव बरुरे,लुल्ला शेख मोठी ताई ,लहान ताई जयश्री शिंदे या सर्वांचेच मनापासून आभार व धन्यवाद मॅट्रिक फेल विजय गायकवाड

7/13/26

एका महामानवाचे एक भव्य स्वप्न ! A grand dream of a great man!


विजय मयान विचार

संपादकीय जाहीरनामा

आमचा उद्देश व्यक्तींची प्रतिमा निर्माण करणे नाही; सत्यापित विचार लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे.

प्रत्येक विचार प्रकाशित करण्यापूर्वी आम्ही उपलब्ध प्राथमिक स्रोत, संदर्भ आणि ऐतिहासिक सत्यतेची शक्य तितकी पडताळणी करण्याचा प्रयत्न करू.

जर एखादा विचार शब्दशः सत्यापित नसेल, तर ते स्पष्टपणे नमूद करू. जर चूक आढळली, तर ती स्वीकारून दुरुस्त करू. कारण विश्वासार्हता ही लोकप्रियतेपेक्षा अधिक महत्त्वाची आहे.

या मालिकेतील प्रत्येक प्रतिमा केवळ प्रेरणा देण्यासाठी नाही, तर विचार, विवेक आणि सत्याचा संवाद घडवण्यासाठी आहे.

आमची निष्ठा कोणत्याही व्यक्ती, विचारसरणी किंवा प्रसिद्धीशी नाही.

आमची निष्ठा सत्याशी आहे.


आमची पाच तत्त्वे

  • सत्य प्रथम

  • संदर्भाशिवाय दावा नाही

  • चूक आढळल्यास त्वरित सुधारणा

  • वाचकाच्या बुद्धिमत्तेचा आणि विवेकाचा आदर

  • ज्ञान सर्वांसाठी, अहंकार कोणासाठीही नाही


शेवटची ओळ

"प्रतिमा लोकांना थांबवेल; सत्य त्यांना पुढे नेईल."

..................................

— संपादकीय मंडळ
विजय मयान विचार

येथे मतांपेक्षा पुराव्याला आणि प्रसिद्धीपेक्षा सत्याला जास्त महत्त्व दिलं जातं.विजय गायकवाड


झेंडा उंचा रहे हमारा" हे गीत गात मिरवणुका काढू लागली,हसतमुखाने तुरुंगात गेली.अल्प शिक्षण घेतलेली आणि हातावर पोट अवलंबून असलेली.

 बाबू गेनूसारखी माणसे मातृभूमीच्या भक्तीने धुंद होऊन जीवाची कुरवंडी करायला सिद्ध झाली. विश्वविद्यालयाच्या उच्च परीक्षांत चमकलेली माणसे खादीविक्री आणि हरिजन सेवा यांच्यासाठी खेडोपाडी पायी फिरण्यात आनंद मानू लागली, "म्हणती स्त्रिया रणी जाऊ ! त्यजिती मुले दिला खाऊ" अशा प्रकारचे तप्त धुंद वातावरण सर्व देशात निर्माण झाले.साहजिकच मातीचा थंड गोळा वाटणारा सामान्य मनुष्य धगधगू लागला,समाजाच्या पायातल्या विविध अवजड, गंजलेल्या शृंखला आपल्याला तोड़न टाकायच्या आहेत या नव्या भव्य स्वप्नाने तो भारला गेला.१९२० ची असहकारितेची चळवळ,१९३० ची मीठ सत्याग्रहाची चळवळ आणि १९४२ ची 'चलेजाव' ची चळवळ यांच्याशी ज्यांचा थोडा फार संबंध आला असेल,निदान जे या चळवळीचे सहृदय साक्षी असतील त्यांना आजकाल एक गोष्ट तीव्रतेने जाणवल्यावाचून रहात नाही,ती म्हणजे त्या काळात सामान्य मनुष्यात निर्माण झालेले चैतन्य,एका विशाल ध्येयाचा त्याच्या जीवनाला झालेला परीसस्पर्श! ते चैतन्य आज अस्तित्वात आहे काय? या प्रश्नाचे प्रामाणिकपणाने उत्तर द्यायचे असेल तर गांधीजींनी ज्या मातीतून माणसे निर्माण केली,त्या मातीत ती पुन्हा मिसळून गेली आहेत हे मान्य केल्याशिवाय गती नाही! प्रभू रामचंद्रांनी आपल्या पदस्पर्शान शिलारूप झालेल्या अहिल्येचा उद्धार केला अशी कथा आपण वाचतो प्रभू रामचंद्र त्या वनातून निघून गेल्यावर अहिल्येची पुन्हा शिळा झाल्याचा विपरीत चमत्कार कोणत्याही रामायणात नमूद केलेला नाही! या देशात गेल्या वीस वर्षांत जे महाभारत घडले त्यात मात्र या विचित्र चमत्काराचे चित्र कुठे स्पष्ट दिसल्यावाचून रहात नाही.

नवा माणूस निर्माण व्हायला हवा.

गांधीजी नव्या माणसाची जी मूर्ती घडवायला निघाले होते,तिचे स्वरूप एकांगी नव्हते.या नव्या माणसाची स्वातंत्र्याची किंवा सुखाची कल्पना स्वतःपुरतीच मर्यादित असणे गांधींना मंजूर नव्हते. "ते स्वातंत्र्य खरे न फक्त अपुली जे तोडिते बंधने। अन्यांच्या पदशृंखलांस बघते निष्कंप ऐशा मने।" या ओळीत 'बी' कवींनी व्यक्त केलेली भावना त्यांना पूर्णपणे अभिप्रेत होती.माणसाचे राजकीय, सामाजिक, आर्थिक, वैचारिक, भावनिक असे तुकडे पाडणे म्हणजे त्याच्या आत्म्याचे तुकडे करण्यासारखे आहे,याची अत्यंत तीव्र जाणीव त्यांच्या ठायी सदैव जागृत होती.ही विविध अंगे असलेला मनुष्य मूलतःएकजीव आहे आणि म्हणून त्याच्या सर्व आविष्कारांत सुसंगती अवश्यमेव हवी,असा त्यांचा अट्टाहास होता.पारतंत्र्याच्या शृंखलांइतक्याच अस्पृश्यतेच्या बेड्या माणुसकीला मारक ठरतात.नवकोट नारायण आणि अठरा विश्वे दरिद्री यांच्यातल्या भेदाइतकाच जातिभेद किंवा वंशभेद अमानुष आहे; म्हणून आता जो नवा माणूस निर्माण व्हायला हवा,त्याने सर्व प्रकारच्या विषमतेविरुद्ध बद्धपरिकर (सिद्ध) झाले पाहिजे,असे गांधीजींचे स्वप्न होते.गांधींनी देशाला अनेक चांगल्या प्रेरणा आणि प्रवृत्ती दिल्या.पण त्यांतली सर्वात मोठी देणगी म्हणजे सामाजिक धर्मबुद्धीची जाणीव ही होय. जगप्रसिद्ध इतिहासकार टॉइन्बी याने असे म्हटले आहे की कोणत्याही राजकीय तत्त्वज्ञानाने मनुष्याचे जीवन सुखी होणार नाही,त्याच्या ठिकाणी जी सुप्त धर्मबुद्धी असते आणि जिच्यामुळे तो भोवतालच्या जगाचा स्नेहशील घटक बनतो.तिचा विकास हाच यापुढे स्वार्थ, संघर्ष,असंतोष आणि महायुद्धे यांच्या काळ्याकुट्ट छायेत वावरणाऱ्या माणसाला खराखुरा दिलासा देऊ शकेल.

स्वातंत्र्योतर काळात या सामाजिक धर्मबुद्धीचे परिपालन आपल्याकडून झाले काय,हा खरा प्रश्न आहे. ही धर्मबुद्धी जागती ठेवणे हे जसे गांधीजींच्या कर्तृत्वाची फळे चाखणाऱ्या त्यांच्या छोट्या-मोठ्या अनुयायांचे काम होते,तसेच गांधीजींच्यामुळे ज्याला जीवनातल्या चैतन्याचा आणि मांगल्याचा साक्षात्कार घडला त्या सामान्य मनुष्याचेही कर्तव्य होते.पण काही अपवाद वगळता सामाजिक धर्मबुद्धीच्या बाबतीत या दोन्ही वर्गांनी गांधींना दगा दिला,असेच प्रचलित वैफल्यावरून वाटते.

याचा अर्थ या देशात गेल्या वीस वर्षात प्रगतिपर असे काही घडले नाही असे नाही.सामाजिक विकासाच्या पाश्चात्त्य मोजमापांनी पाहिले तर आपण बरीच धडपड केली आहे.आकडेशास्त्राच्या आधारेच बोलायचे असेल तर गेल्या वीस वर्षाची वकिली करणे सोपे आहे. साक्षरता इतकी वाढली,दरडोई उत्पन्न अमुकपट झाले आहे.कुटुंब नियोजनावर इतके कोटी रुपये खर्च होत आहेत,इत्यादी तपशील खुलासेवार खुलवून सांगायला चतुर वक्त्याची जरूर आहे असे नाही.

ही समृद्धीची गंगा तळाच्या तहानलेल्या भूमीपर्यंत पोहचली आहे काय ?हा तपशील कुणीही अमान्य करणार नाही. शतकानुशतके विज्ञानाकडे पाठ फिरवून बसल्यामुळे आपण साध्यासुध्या गरजांच्या बाबतीतसुद्धा करंटे बनून गेलो होतो.स्वातंत्र्य मिळाल्यावर आपण विज्ञानसन्मुख झालो.

त्याच्या सहाय्याने भौतिक समृद्धी निर्माण करण्याच्या मार्गाला लागलो.या प्रयत्नांत द्रष्टेपणाच्या अभावी काही दोष निर्माण झाले असतील,इथली माती,इथला माणूस, इथल्या शक्ती आणि इथल्या मर्यादा यांचा विचार जसा व्हावा तसा झाला नसेल,औद्योगिक शक्ती ही एक प्रचंड राक्षसी शक्ती आहे.अल्लाउद्दिनाच्या दिव्याप्रमाणे ती क्षणार्धात राजवाडा निर्माण करू शकते,पण या राक्षसी शक्तीच्या जबड्यात सापडलेला मनुष्य एका अजस्त्र यंत्रातला अनामिक खिळा बनून जातो, भावनिक जीवनाला पारखा होतो,शरीरसुखे हात जोडून पुढे उभी असूनही त्याचे मन एका भयानक पोकळीत फडफडत राहते. 

इत्यादी गोष्टींकडे आवश्यक तेवदे लक्ष दिले गेले नसेल. हे सारे एक वेळ स्वाभाविक मानता येईल.कारण यांतले अनेक प्रश्न आजच्या भारताचे नसून उद्याच्या भारताचे आहेत,मूलतः ते साऱ्या जगाचेच आहेत! पण ही भौतिक समृद्धीची धडपड सुरू असताना गांधीजींनी जागृत केलेली सर्वसामान्य मनुष्याची सामाजिक धर्मबुद्धी उजळ आणि निर्मळ राहिली आहे काय? का त्या ज्योतीने काजळी धरली आहे? दैनिके वाचताना, सभासंमेलनाचे कार्यक्रम पाहताना भाणि सर्व क्षेत्रांतल्या पुढाऱ्यांची भाषणे ऐकताना सर्वत्र आबादीआबाद आहे असा भास होतो! गांधीजींना अभिप्रेत असलेल्या सामाजिक धर्मबुद्धीचा अंकुर उगवला तोच करपून गेला याची खंत कुणाला वाटत असलेली आढळत नाही.पण सार्वजनिक भाषणे,दर्शन,प्रदर्शने ही रंगमंचावरील नाटके असतात हे लक्षात घेऊन दैनंदिन सामाजिक जीवनाचे, संभाषणाचे मनोगतांचे आणि स्थित्यंतरांचे आपण निरीक्षण करू लागलो तर काय अनुभव येतो? साक्षरता झपाट्याने वाढत आहे. शिक्षणप्रसाराला भरती आली आहे.पण शहरी व ग्रामीण समाज सुसंस्कृत होत असल्याची चिन्हे मात्र कुठेच दिसत नाहीत! पदवीधरांच्या कारखान्यातून भरपूर माल बाहेर पडत आहे,पण ज्ञान विज्ञानाच्या आणि कला शास्त्रांच्या उपासनेत गढून गेलेले तरुण दुर्मीळ आहेत.बौद्धिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातली शिखरे गाठण्याकरता जीवाची कुरबानी करणारे शोधूनही मिळणे मुष्किल आहे.दरडोई वार्षिक उत्पन्न वाढले हे खरे! पण वाढती महागाई लक्षात घेता सामान्य मनुष्याचे जीवनमान उंचविण्याची शक्ती या आकड्यांच्या मायाबाजारात आहे काय? देशात निर्माण झालेली समृद्धीची गंगा सामाजिक तळाच्या तहानलेल्या भूमीपर्यंत जाऊन पोहचली आहे काय? या किंवा अशा प्रकारच्या अनेक प्रश्नांची उत्तरे उघड आहेत.डॉ. राममनोहर लोहियांसारख्या दलितांच्या झुंजार कैवाऱ्यांनी ती पूर्वीच परखडपणे व्यक्त केली आहेत !


गांधीजींना समाजाचे तसेच व्यक्तीचेही परिवर्तन हवे होते.

दुसऱ्या एका बाजूने गांधीजींना अभिप्रेत असलेल्या सामाजिक धर्मबुद्धीचा विचार करता येईल. स्वातंत्र्यपूर्वकाळातले शिक्षक,डॉक्टर,वकील,व्यापारी, पत्रकार,साहित्यिक,कलावंत इत्यादिकांच्या जीवनक्रमात देशभक्तीच्या भावनेचे जे सहजस्फुरण दृग्गोच्चर होत असे ते आजकाल दुर्मीळ का व्हावे? आजच्या गरिबांच्या जगात अमृताहूनही दुष्प्राप्य झालेले तूप आपल्या पोळीवर ओतून घेण्याची अहमहमिका जुने श्रीमंत आणि नवे धनिक यांच्यामधे किळसवाण्या रीतीने का प्रगट होत आहे? काटेकोर कायदे होऊनही ठिकठिकाणी हरिजनांचा अमानुष छळ होत असल्याच्या वार्ता कानावर का पडतात.? स्वातंत्र्योत्तर काळात श्रीमंत अधिक श्रीमंत झाले आणि बहुसंख्य गरीब अधिक गरीब झाले हे सिद्ध करायला अर्थशास्त्रज्ञ कशाला हवेत? लोकशाही समाजवादाचे ढोल आणि गांधीजींच्या राष्ट्रपितृत्वाचे नगारे कानीकपाळी बडविले जात असताना आर्थिक विषमतेची दरी अधिक रुंद आणि अधिक खोल का होत आहे?

भरतीच्या वेळी समुद्राचा किनारा अवखळपणाने पुढे धावणाऱ्या आणि फेसाळत फुटणाऱ्या लाटांनी भरून जातो.जिकडे तिकडे पाणीच पाणी दिसू लागते.पण ओहोटी सुरू झाली की हे सुंदर,उत्साहवर्धक दृश्य पार पालटून जाते ! समुद्राचे पाणी मागे हटू लागते. किनाऱ्याचा रुंद पट्टा उघडा पडल्यामुळे भकास भासू लागतो.भरतीच्या पाण्याने लपविलेल्या किनाऱ्यालगत लहान मोठे खडक उघडे पडून या दृश्याच्या उदासपणात भर घालतात.

किनाऱ्यावर पाचोळा आणि इतर घाण इतस्ततः पडलेली दिसते.नकळत हे सर्व प्रेक्षकाला निरुत्साही बनविते.

आजची भारतीय मनुष्याची परिस्थिती आणि मनःस्थिती यांचे जे चित्र दिसते,ते या ओहोटीच्या दृश्यासारखेच आहे काय ?

जीवनाची सामाजिक आणि आर्थिक बांधणी परंपरागत मार्गापेक्षा अत्यंत भिन्न पद्धतीने सुरू झाली आहे.या नावीन्यात आजच्या विफलतेचा उगम असेल काय? इमारत बांधली जात असताना डोळ्यात भरत नाही.ती वेडीवाकडी,ओबडधोबड भासते.रंगरंगोटी करून पूर्ण स्वरूपात ती समोर उभी राहिली म्हणजे सुंदर वाटते. आज सर्वसामान्य माणसाचे मन निरुत्साही आणि जीवन प्रवाहपतित झाले आहे.याचे मूळ संक्रमणाच्या वेगातून असू शकेल काय?

गांधीजींच्या स्वप्नांतला हा नवा भारतीय माणूस का गुप्त झाला?

गांधीजींना जसे समाजाचे तसेच व्यक्तीचेही परिवर्तन हवे होते.देशाच्या राजकीय घडीप्रमाणे त्याची आर्थिक शैक्षणिक,

सामाजिक आणि सांस्कृतिक घडीही निराळ्या पद्धतीने बसविण्याचे स्वप्न त्यांनी सतत उराशी बाळगले होते.त्या दिशेने त्यांनी विविध उपक्रम सुरू केले होते. पण सर्व प्रकारच्या विषमतेपासून अलिप्त असलेले परिवर्तन हवे असेल,तर त्याला आधारभूत असलेल्या मूल्याची प्राणपणाने जपणूक करणारा मनुष्यही निर्माण झाला पाहिजे,हे ते पुरेपूर जाणून होते.त्या दृष्टीने त्यांनी केलेले प्रयत्न अल्पप्रमाणात का होईना यशस्वी होत असल्याचा भास होत होता.

पण १९४८ नंतर गांधीजींच्या स्वप्नातला हा नवा भारतीय माणूस एकाएकी गुप्त झाला.तो खरोखर अस्तित्वातच आला नव्हता काय,ही शंका आज अनेकांना बेचैन करीत आहे की प्रखर उन्हात मृगजळाचा भास व्हावा त्याप्रमाणे गांधीजींच्या तेजस्वी व्यक्तिमत्त्वामुळे त्यांच्या शिकवणुकीच्या कक्षेत आलेली माणसे त्या काळापुरतीच बदलली होती?या शेवटच्या प्रश्नातून एक मूलभूत प्रश्न डोळ्यांपुढे उभा राहतो. वासना आणि विकार यांचे अस्तित्व ही माणसाची प्रकृती आहे.जागृत आत्मशक्तीचे लेणे लाभलेल्या निवडक व्यक्ती या प्रकृतिधर्मावर विजय मिळवू शकतात,पण सर्वसामान्य माणसाचे अंतरंग गांधीजींना हवे होते.तसे बदलणे शक्य आहे काय? संत,प्रेषित,क्रांतिकारक आणि मांगल्याचे उपासक हे स्वभावतःच स्वप्नाळू असतात.निर्दोष मानवी संस्कृतीचे एक रम्य, भव्य स्वप्न त्यांच्या डोळ्यांपुढे तरळू शकते. "ईशावास्यमिदं सर्वम" हे अधिकारवाणीने सांगणाऱ्या वैदिक ऋषींनी हे स्वप्न पाहिले होते! बुद्ध,ख्रिस्त आणि ज्ञानेश्वर,

कबीर यांच्या प्रज्ञेलाही त्याचे दर्शन झाले होते.अगदी अलीकडच्या काळात टॉलस्टॉय टागोरांसारखे प्रतिभावंत या स्वप्नाच्या ध्यासाने धुंद झालेले आपण पाहिले आहेत.दैनंदिन क्रियाशील जीवनात गांधीजी याच स्वप्नाचा मागोवा घेत राहिले,त्यांच्या हयातीत हे स्वप्न वास्तवाच्या कुशीत विसावण्याकरता येत आहे, असा गोड भास लक्षावधी लोकांना झाला.पण गेल्या वीस वर्षांतला प्रत्यक्ष अनुभव अगदी निराळा आहे.भारतीय संस्कृती आणि गांधीजींची शिकवण ह्या दोन तटांमधून वाहू लागलेली ही निर्मळ स्वप्नसरिता अवघ्या दीड तपात पूर्णपणे गढूळ होऊन जाईल.ज्या मूल्यांपुढे पिढ्यानपिढ्या लोक नतमस्तक होत होते ती सर्व हा हा म्हणता पायदळी तुडविली जातील. त्याग आणि सेवा या मंत्रांचे पठण जिथे सुरू होते,तिथे भोग आणि स्वार्थ यांच्या नंग्या नाचाला टाळ्या पडत राहतील,भ्रष्टाचार आणि काळाबाजार ही जीवनाची अविभाज्य अंगे हेऊन बसतील,असे भविष्य १९४७ पूर्वी कुणी वर्तविले असते,तर त्याची निःसंशय वेड्यात गणना झाली असती.

आंतरिक प्रकाशाची पूजा

मात्र आज सभोवतालचे दाहक वास्तव करुणरवाने एकच गोष्ट सांगत आहे ती ही की गांधीजींच्या काळात भारतीय मनुष्याचे अंतरंग बदलत आहे,असे जे दृश्य दिसत होते,तो केवळ एक भास होता! 

"मनुष्याच्या अंतरंगात नेहमीच एक पशु दबा धरून बसलेला असतो." असे शोपेनहारने म्हटले आहे. भारतीय मनातल्या या पशूला काही काळ माणसाळविण्याचे काम गांधींनी केले. पण स्वातंत्र्य मिळून सत्ता आणि संपत्ती यांची प्रलोभने पुढे येताच त्या पशूचा हिंस्रपणा पूर्णत्वाने जागा झाला!

माणसातले पशुत्व आणि माणुसकी यांचा हा संघर्ष सनातन आहे.त्याचे अस्तित्व प्रत्येक व्यक्तीने आणि प्रत्येक पिढीने मान्य केले पाहिजे.हे अस्तित्व हेच एका दृष्टीने संस्कृतीचे उगमस्थान आहे.आजची मानवी संस्कृती शतकानुशतके समर्थ सज्जनांनी केलेल्या उग्र तपश्चर्येचे फळ आहे.माणसाची प्रकृती आणि मानवी संस्कृती यांच्यामधल्या संघर्षाचे सूत्र कालमानानुसार बदलले,तरी तो संघर्ष जसा अनादी तसाच अनंत आहे. शिवाय हीही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की कोणतीही नवी संस्कृती चटकन् समाजाच्या पचनीं पडत नाही. तिचा जेवढा अंश सर्वसामान्य माणसाच्या प्रकृतीमध्ये मिसळून एकरूप होतो,तेवढाच समाज परिवर्तनाला पोषक ठरतो.

गांधीजींच्या मागून तितक्याच समर्थपणाने सामाजिक धर्मबुद्धीची बीजे जनमनात फुलवीत रहाणारा प्रभावी नेता भारताला मिळाला असता तर आज अगतिक झालेल्या आपल्या सामाजिक मनाची ही दुर्दशा कदाचित टळली असती.पण इतिहास उच्चरवाने नेहमीच सांगत आला आहे."सारे महापुरुष एकाकी असतात.! त्यांना त्यांच्या तोडीचे वारस कधीच लाभत नाहीत. महामानवांची परंपरा अखंडित राहणे नियतीला मंजूर नाही."

ते काहीही असो! ज्या सामान्य मनुष्यावर गांधीजींनी जीवापाड प्रेम केले,त्यांनी सभोवताली पसरलेल्या दाट धुक्यातही आकाशात सूर्य प्रकाशत आहे ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे.तत्कालिक सुखाच्या हव्यासाने उफाळून येणाऱ्या मनोविकारांचा माणूस गुलाम झाला,तर या यांत्रिक युगात तो आपला आत्मा पूर्णपणे गमावून बसेल!ज्या समाजाला श्रेष्ठ प्रकारचे नैतिक अधिष्ठान असते,तिथेच असामान्याप्रमाणे सामान्यानाही समृद्धी आणि शांती यांचा लाभ होण्याची शक्यता अधिक असते.नैतिक मूल्यांचे परिपालन ही गांधीजींच्या दृष्टीने सर्व मानवी व्यवहार सुखप्रद होण्याची गुरुकिल्ली आहे म्हणून भोवताली दिसणाऱ्या विपरीत दृश्यांनी मन गोंधळू न देता गांधीजींनी दिलेला मूल्यांच्या जपणुकीचा वारसा यथाशक्ति संभाळणे हे प्रत्येक सामान्य मनुष्याचे कर्तव्य आहे.

यासाठी त्याला अंतर्मुख व्हावे लागेल,त्याग करावा लागेल,

सामाजिक धर्मबुद्धीच्या ध्रुवताऱ्यावर दृष्टी ठेवून आपली जीवननौका हाकारावी लागेलं.कठोर कायद्यांनी किंवा रक्तरंजित क्रांतीने समजाचे बाह्यरूप बदलते.पण त्याचे अंतरंग तसेच रहाते.

विज्ञानाचे राक्षसी सामर्थ्य आणि यंत्रयुगामुळे निर्माण होणारी भावनांची शुष्कता यांच्या कात्रीत सापडून मानवी आयुष्य हे केवळ जंतूचे जीवन होऊ नये असे ज्याला ज्याला वाटत असेल, त्याने त्याने सामाजिक धर्मबुद्धीशिवाय मानवाला यापुढे दुसरा तरणोपाय नाही, हे लक्षात ठेवले पाहिजे

भारतीय मन गेल्या वीस वर्षांत ज्या आंतरिक प्रकाशाच्या पूजेला अंतरले आहे,त्याचा या गांधी जन्मशताब्दीच्या वर्षात आपण सर्वांनी पुन्हा शोध केला पाहिजे,हा प्रकाशच आजच्या असुरक्षित जगात सामान्य मनुष्याचा खराखुरा आधार होऊ शकेल.

…………..।।।।……

१,२ : हा लेख १९६९ साली 'धरती' या विशेषांकात प्रसिद्ध झालेला असल्याने त्या काळानुसार आलेले संदर्भ.

|| २ ||

अलीकडेच तरुण पिढीच्या काही प्रतिनिधींशी मनमोकळेपणाने गप्पा गोष्टी करण्याचा योग आला.हे सारे विद्यार्थी होते.पदवीधर झालेले आणि पुढील विद्याभ्यासात व पसरलेल्या अफाट विश्वाचं निरीक्षण करू लागावं त्याप्रमाणं आजच्या कडू गोड जीवनाचा सामाजिक सुखदुःखांत रस घेणारे,पंख फुटलेल्या पिलांनी घरट्याबाहेर पडून सभोवताली अनुभव घेणारे आणि त्याचा अन्वयार्थ लावण्याचा प्रयत्न करणारे असे हे तरुण होते.बोलता बोलता तरुण पिढीच्या सध्याच्या वैफल्याच्या मुळाशी कोणकोणती कारणे आहेत हा विषय निघाला.आपल्या मनातील सारी शल्यं त्यांनी सांगावीत म्हणून ती थोडक्यात शब्दबद्ध करण्याची मी त्यांना विनंती केली.आढेवेढे न घेता त्यांनी आपले टिपण माझ्याकडं दिलं.

या तरुण अंतःकरणांना सलणाऱ्या अनेक शल्यांपैकी एक त्यांच्याच शब्दांत सांगतो.

"केवळ तात्त्विक चर्चा करणारे पण ती तत्त्वे आचरणात न आणणारे मागच्या पिढीतले लोक,विशेषतः केवळ भाषणबाजी करणारे गांधीवादी आम्हाला भेटतात,त्या वेळी आम्हाला त्यांच्याविषयीच नव्हे तर त्यांच्या तत्त्वज्ञानाविषयी आणि पर्यायानं गांधींविषयी घृणा निर्माण होते."

गांधी जन्मशताब्दीचे समारंभ आता सर्वत्र साजरे होत असताना सुबुद्ध आणि सुशिक्षित तरुणांच्या तोंडून “आम्हाला गांधीविषयी घृणा वाटते." असे शब्द निघावेत याचं मला जितकं आश्चर्य वाटलं तितकंच दुःख झालं. स्वभावतः मी व्यक्तिपूजक नाही.

विभूतिपूजेच्या प्रथेमुळे भारतातल्या सामान्य मनुष्याचं मनं खुरटं राहिलं आहे याची जाणीव मला आहे.त्यामुळं टिळक - गांधी असोत अथवा गेल्या दीडशे वर्षात आपल्या देशात होऊन गेलेले इतर थोर पुरुष असोत,त्यांच्याविषयी माझ्या मनात अत्यंत आदर असला तरी अंधभक्ती मात्र मुळीच नाही. प्रत्येक महापुरुषाचं जीवन भविष्यकालावरच्या निकषांवर घासलं गेल्यानंतर मगच त्यात सोनं किती आणि हीण किती हे कळू शकतं;हे सत्य मला अपरिचित नाही.पण गांधीजींच्या अभूतपूर्व कर्तृत्वाच्या काळात विशीपासून पन्नाशीपर्यंत माझं आयुष्य गेलं. साहजिकच,या तरुणांच्या मनातली गांधीजींविषयीची अप्रीती (घृणा हा शब्द त्यांनी अनवधानानं वापरला असावा असं मी समजतो) चटकन् समजावून घेणं मला कठीण गेलं.

या तरुण मंडळींचा हा राग पूर्वग्रहदूषित नव्हता.ज्याचं जळतं त्याला कळतं हे मनाला जाणवण्याइतकी त्यांच्या अंतरींची व्यथा स्पष्ट दिसत होती.

मी त्यांच्या आक्षेपांचा विचार करू लागलो. पहिला प्रश्न होता गांधीवादाचा.त्याचं उत्तर गांधीजींच्या शब्दांत देणं फार सोपं काम आहे.गांधीवाद म्हणून एक स्वतंत्र तत्त्वज्ञान आहे हे खुद्द गांधींनाच मान्य नव्हतं।

अपुरे राहिलेला भाग पुढील लेखामध्ये….।


7/11/26

एका महामानवाचे एक भव्य स्वप्न ! A grand dream of a great man!

वि. स. खांडेकर

त्यावेळी गांधीजी नुकतेच आफ्रिकेतून मायदेशी परतले होते.आपले गुरू गोपाळ कृष्ण गोखले यांना भेटावे आणि त्यांच्या सल्ल्याने देशसेवेचा भावी कार्यक्रम निश्चित करावा असे त्यांनी ठरविले होते.पुण्याला गोखल्यांच्या भारत सेवक समाजात ते काही दिवस येऊन राहिले होते.त्यांचे अनवाणी चालणे,शेंगदाणे किंवा असलेच काही मोजके पदार्थ घेऊन भोजन करणे इत्यादी व्रतस्थ मनोवृत्ती दर्शविणाऱ्या गोष्टी कर्णोपकर्णी आम्हा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या कानांवर पडत होत्या.आश्चर्यमिश्रित आदराने आम्ही त्या ऐकत होतो. 'मासिक मनोरंजना'च्या त्यावेळच्या एका अंकात गांधी आणि कस्तुरबा यांचा फोटो प्रसिद्ध झाला होता.तो पाहून माझ्यासारख्या तारुण्याच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या विद्यार्थ्याच्या मनात उठलेले वादळ चित्रित करणे मोठे कठीण आहे.त्या फोटोतले गांधी एका बाजूने त्यांचे जग आमच्या जगापेक्षा भिन्न आहे,याची जाणीव होऊन ते फार दूरचे वाटू लागत.

स्वातंत्र्ययुद्धाची सूत्रे हलविणारा अर्धनग्न सेनापती

पण एक गोष्ट निश्चित होती.छायाचित्रांतल्या अत्यंत साध्या पोषाखातल्या गांधींच्या मूर्तीने अनेक तरुणांच्या अंतरीची एक अनामिक तार छेडली होती.आजच्या मानाने त्या काळी सुटाबुटातला मनुष्य बराच दुर्मीळ होता.सुटाबुटाभोवती परकीय राज्यकर्त्यांच्या प्रतिष्ठेचे एक झगझगीत वलय सदैव पसरलेले असे.हे सूटबूटमाहात्म्य एवढे मोठे असूनही बॅरिस्टर झालेला हा मध्यमवयीन मनुष्य इतका साधा पोषाख का करतो, नुसत्या साध्याच नव्हे तर जवळजवळ खेडवळ वाटेल अशा पेहरावात का वावरतो,हे कोडे त्यावेळी मी सोडविण्याचा प्रयत्न केला.पण मला ते सुटले नाही. मात्र काठेवाडी फेटा,बाराबंदीसारखा पायघोळ अंगरखा आणि जाडेभरडे टाचके धोतर अशा वेषातील गांधीजींची ती मूर्ती माझ्या मनावर कायमची कोरली गेली.

गांधीजींचा हा साधा वेषसुद्धा पुढे फार दिवस टिकला नाही.

लवकरच त्याचे रूपांतर खादीची पैरण,पांढरी टोपी आणि त्या सरंजामाला शोभेल असे धोतर या अतिसाध्या पोषाखात झाले.हाही अवतार अल्पकाळ टिकला आणि गांधीजी पुढे आमरण ज्या वेषात वावरले तोच छायाचित्रांनी आणि प्रतिमांनी जनमानसात अमर केला.डोक्यावर कसलेही शिरोभूषण नाही,गुडघ्याच्या खाली कसेबसे पोहोचेल असे पंचेवजा धोतर

आणि अंगावर एखादी चादर अथवा शाल याच वेषात भारतीय जनतेची अस्मिता जागृत करणारे नेते म्हणून आणि दोन तपांपेक्षा अधिक काळ स्वातंत्र्ययुद्धाची सूत्रे हलविणारे सेनापती म्हणून गांधीजी काम करीत राहिले.

गोलमेज परिषदेच्या वेळी गांधी इंग्लंडमध्ये गेले असताना बादशाहांनी त्यांच्या भेटीची इच्छा प्रदर्शित केली.राव-रंक सारेच गांधीजींचे मित्र.साहजिकच गांधींनी भेटीला जायचे मान्य केले.मात्र ज्याच्या साम्राज्यावर सूर्य कधीही मावळत नव्हता,अशा राजाच्या भेटीला जातानासुद्धा आपल्या वेषात सूतभरही फरक करण्याचे त्यांनी नाकारले.

इंग्लंडमध्ये राजदर्शनाकरिता विशिष्ट प्रकारचा साहेबी पोषाख करण्याचा शिष्टाचार आहे.तो गांधींना समजावून सांगण्यात आला.पण "राजेसाहेबांची व माझी भेट व्हायची असेल तर ती माझ्या नेहमीच्या पोषाखातच होईल." असे गांधीजींनी निक्षून सांगितले. जेय देशातील एका 'अर्धनग्न फकिराच्या' भेटीसाठी बकिंगहॅम पॅलेसमधील शिष्टाचारांना तात्पुरती रजा देण्यात आली!सर्वसामान्य भारतीय शेतकऱ्याच्या वेषाशीं साम्य पावणाऱ्या पोषाखातच गांधीजी दीर्घ काळ वावरले. 

हा वेष त्यांनी का स्वीकारला हे इतिहासाने स्पष्ट केले आहे.

गांधीजींच्या सर्व चळवळींचा,साऱ्या शिकवणुकीचा आणि प्रयोगशील जीवनाचा केंद्रबिंदू सामान्य मनुष्याचे पुनरुत्थान करून त्याची भौतिक आणि आत्मिक उंची वाढविण्याची पराकाष्ठा - हाच होता.ज्याचे नाव उभ्या जन्मात वृत्तपत्रात येण्याचा संभव नाही,पण जो आपल्या वाट्याला आलेले जीवन जिद्दीने जगण्याची धडपड करीत आहे असा अनामिक सामान्य मनुष्य हे गांधीजींचे दैवत होते.त्या माणसाविषयी त्यांच्या अंतःकरणात अपार भक्ती भरली होती.तथाकथित राजकीय मुत्सद्दी किंवा मोठमोठे पंडित यांच्यापेक्षा त्यांचे आंतरिक आणि स्नेहपूर्ण नाते होते ते या अज्ञात सामान्य माणसाशी!

आफ्रिकेत गांधीजी झगडले,सत्याग्रहाचे शस्त्र घेऊन लढले,ते याच सामान्य माणसावर होणारा अन्याय दूर व्हावा म्हणून! भारतांत अत्याचार या सामान्य माणसाच्या दुःस्थितीने व्यथित होऊनच त्यांनी त्याच्या उद्धाराचे कंकण हाती बांधले.चंपारण्यातला लढा, असहकारिता,खादीप्रचार,हरिजनसेवा,तिसऱ्या वर्गाचा प्रवास आणि भंगी वस्तीतला निवास या साऱ्या गोष्टी सामान्य माणसावरच्या त्यांच्या आत्यंतिकप्रेमाच्या निदर्शक होत्या.त्यांनी शेवटी स्वीकारलेला वेष हे त्यांच्या अंतरंगाच्या या उत्कट प्रेमाचे प्रतीक होते. 

'बुडती हे जन। पहावेना डोळा' असा सामान्य माणसाविषयीचा आपल्या अंतरीचा कळवळा तुकोबांनी व्यक्त केला आहे. सर्व संतांनीही आपल्या परीने ही अंतरीची व्यथा प्रकट केली आहे. सामान्य माणसाच्या दुःखाने त्यांची अंतःकरणे हेलावून जात असतील, हे काय कुणी कुणाला सांगायला हवे? पण संतांनी सामान्य मनुष्याची चिंता वाहिली ती मुख्यतः आध्यात्मिक दृष्टीने.विज्ञानविन्मुखतेच्या काळात वैराग्याचा वसा घेतलेल्या करुणावंतांना अन्य मार्ग सुचणे अशक्य होते

सामान्य मनुष्याच्या दररोजच्या हलाखीच्या जीवनात संतांनी सहसा लक्ष घातले नाही,किंबहुना ऐहिक जीवन हा,भारतातल्या काय किंवा अन्य देशांतल्या काय, साधुसंतांनी आपल्या चिंतनाचा प्रधान विषय कधीच मानला नाही.याला अपवाद असलेले रामदासांसारखे संत फार थोडे !

अन्याय,अज्ञान,अनीती व दारिद्र्य यांच्याविरुद्ध बंड

मात्र गांधीचे संतांशी एका बाजूने अगदी निकटचे नाते असले,तरी त्यांनी सामान्य मनुष्याच्या जीवनाचा जो विचार केला त्यात केवळ परलोकाला प्राधान्य नव्हते. माणसाला माणूस म्हणून या जगात जगविणे या ध्येयावरली त्यांची दृष्टी कधीच विचलित झाली नाही. गांधीजींच्या चिंतनात ऐहिक जीवनाच्या सर्व अंगोपांगांना स्थान होते.वैयक्तिक जीवनात यतिधर्मांचा पुरस्कार करणारे गांधीजी सामान्य मनुष्याच्या सर्व ऐहिक गरजांचा सूक्ष्म दृष्टीने विचार करीत असत.धर्मबुद्धी ही ईश्वर,अध्यात्म,परलोक इत्यादी गोष्टींशीच संबद्ध असलेली भावना नाही;सर्वसामान्य माणसाच्या दैनंदिन जीवनातही तिला स्थान आहे;आणि अन्याय, अज्ञान,अनीती व दारिद्र्य यांच्या विरुद्ध बंडाचा झेंडा उभारणे हे त्या धर्मबुद्धीचे परमपवित्र कर्तव्य आहे हे गांधींनी पंचविशीतिशीतच जाणले.

मानवी जीवन सुखी समृद्ध आणि सत्प्रवृत्त व्हावयाचे असेल तर दैनंदिन जीवनात धर्मबुद्धी सदैव जागरूक असली पाहिजे हे गांधींइतके सातत्याने आणि स्वच्छपणाने जगातील कोणत्याही राजकीय,सामाजिक वा आध्यात्मिक नेत्याने सांगितले नव्हते.

या नव्या धर्मबुद्धीची जाणीव गांधींच्या ठिकाणी किती प्रखर होती,याचे ते आफ्रिकेहून हिंदुस्थानात परत आले तेव्हाचे एक उदाहरण देण्याजोगे आहे - १९१६ च्या प्रारंभी बनारस हिंदू युनिव्हर्सिटीचा उद्घाटनसमारंभ होता.त्यात बोलण्याविषयी पंडित मालवीयांनी गांधींना निमंत्रण दिले.गांधींनी ते स्वीकारले.या समारंभाला बडेबडे संस्थानिक जुन्याकाळी स्वयंवराला जमत असत,त्याप्रमाणे नटून सजून आले होते! ता. ४ फेब्रुवारी १९१६ रोजी या समारंभात गांधी बोलले. या भाषणात त्यांनी अनेक ज्वलंत विचार प्रकट केले. "भाषा हे माणसाचे प्रतिबिंब आहे.

आपले विचार प्रकट करण्यास आपल्या भाषा जर असमर्थच असतील तर आपण जिवंत राहण्यापेक्षा मरून गेलेले बरे!" ही त्यातली एक ठिणगी! कागदी योजनेच्या बळावर आपण स्वराज्य मिळवू शकणार नाही,आपण स्वराज्याला पात्र ठरणार आहोत ते केवळ आपल्या कृतीच्या जोरावर.स्वराज्य मिळविण्याचा प्रयत्न करीत असताना आपण आपल्यातील दोष काढून टाकण्याचा प्रयत्न कसोशीने केला पाहिजे" - दुसरा स्फुल्लिंग! पण एवढ्यावरच ते थांबले नाहीत.ते पुढे म्हणाले, "काल या समारंभाच्या अध्यक्षांनी आपल्या भाषणात हिंदुस्थान देशाच्या दारिद्र्याचा उल्लेख केला. इतर अनेक वक्त्यांनी या मुद्यावर विशेष भर दिला.पण व्हॉईसरॉयांच्या हस्ते कोनशिलासमारंभ झाला त्यावेळी आपल्याला मंडपांत कोणते दृष्य दिसले? मला तर मंडपांत हिऱ्या-मोत्यांचे व जड जवाहिऱ्यांचे एक जंगी प्रदर्शन भरल्याचा भास होत होता.असले मौल्यवान दागिने घालून मिरविणाऱ्या संस्थानिकांना व सरदार दरकदाराना पाहून माझ्या मनात विचार आला की त्यांनी आपल्या अंगावरील हे दागिने देशबांधवांना देऊन टाकले नाहीत तोपर्यंत त्यांचे दारिद्र्य दूर होणार कसे? ब्रिटिश हिंदुस्थानात किंवा एखाद्या संस्थानात एखादा राजवाडा अथवा टोलेजंग इमारत उभारण्यात येणार असल्याची वार्ता माझ्या कानावर आल्याबरोबर माझ्या मनात पहिला विचार येतो स्वतः आपल्या शेतकऱ्याला लुबाडीत आहोत किंवा इतरांना लुबाडू देत आहोत तोपर्यंत तो हा की "अरेरे! हा सारा पैसा शेतकऱ्याकडून लुबाडण्यात आलेला आहे. आपण आपली स्वराज्याची तळमळ खरी आहे असे मुळीच म्हणता येणार नाही."

हरिजनांच्या दुःखाची समस्या

सामान्य मनुष्याविषयी गांधींना वाटणारे हे उत्कट ममत्व केवळ बौद्धिक,भावनिक अथवा व्यवहारिक स्वरूपाचे नव्हते.त्यात पुढारीपणाचा अभिनिवेश अथवा स्वप्नाळू करुणेचा लवलेश नव्हता.पुढारी होणाऱ्या मनुष्याला समाजाविषयी आपुलकी वाटते; मात्र, “ऐसी कळवळ्याची जाती। लाभाविण करी प्रीती।" या तुकारामांच्या कसोटीला तो सहसा उतरत नाही. ज्याच्या अंगी उपजत कळवळा नसतो, त्यालाही त्याचे शक्य तेवढे नवरसपूर्ण नाटक करावेच लागते. त्याशिवाय त्याचे सामाजिक स्थान स्थिर होत नाही आणि सुरक्षित राहत नाही.अशा विविध बुद्धिवान आणि कर्तृत्ववान लोकांपैकी एखाद्याने व्यक्त केलेला कळवळा अब्राहम लिंकन,मोहनदास गांधी किंवा मार्टिन ल्यूथर किंग यांच्याप्रमाणे अंतरंगातून उचंबळून आलेला स्त्रोत असत नाही.पंडिताने बुद्धिकौशल्याने सुलभ पद्यरचना करावी तसे पुढाऱ्यांचे बोलणे,चालणे आणि वागणे वाटते.हृदयाच्या हृदयातून निघालेल्या काव्याशी तुलना केली की ती पद्यरचना कृत्रिम,नाटकी आणि निर्जीव वाटू लागते.

या बाबतीत गांधीजी बड्याबड्या नेत्यांहून सर्वस्वी भिन्न होते.आपली मुले अर्धपोटीच झोपी गेलेली पाहून अंथरुणावर तळमळत पडणाऱ्या माउलीप्रमाणे भारतात सर्वत्र पसरलेल्या कोट्यवधी दलित,पीडित आणि वंचित जनतेविषयी त्यांचे मन अष्टौप्रहर चिंतन करी.त्यामुळे राजकीय स्वातंत्र्याची चळवळ अधिक समर्थ कशी करता येईल या एकाच विचाराने त्यांचे मन संपूर्णपणे कधीही व्यापून टाकले नाही.राजकीय आंदोलनांच्या धुमश्चक्रीतच आर्थिक आणि सामाजिक परिवर्तनाला पोषक अशा अनेक चळवळी त्यांनी सुरू केल्या. हरिजनसेवा ही त्यांतलीच एक फार महत्त्वाची प्रवृत्ती. राजकीय व्यासपीठावरून

पूर्वीच्या कुणाही पुढाऱ्याने हरिजनांच्या दुःखांचा आणि समस्यांचा इतक्या मूलग्राही पद्धतीने आणि अथांग आपुलकीने विचार केला नव्हता.पण शतकानुशतके अन्यायाला बळी पडलेल्या या दलित समाजाचा कैवार घेऊन गांधीजी पुढे सरसावले आणि कामाला लागले. सामान्य मनुष्याविषयी त्यांना वाटणारी ही आत्मीयता भारताच्या सामाजिक इतिहासात अपूर्व होती.

अपर्णादेवीच्या सिद्धार्थाची गोष्ट

बनारस हिंदू युनिव्हर्सिटीतल्या भाषणाप्रमाणेच त्यांची दुसरी एक आठवण सांगण्याजोगी आहे व चित्तरंजनदास यांच्या कन्या श्रीमती अपणदिवी यांनी डॉ. सुनीतीकुमार चटर्जी यांना सांगितलेली ही आठवण अशी आहे.

अपणदिवीचा पहिला मुलगा सिद्धार्थ.देशबंधुदास हे त्याचे आजोबा.त्यांनी आपल्या लाडक्या नातवाला नाना प्रकारच्या मौल्यवान अलंकारांनी नटविले होते.एकदा गांधीजी दासबाबूंना भेटावयाला त्यांच्या घरी आले. अपणदिवीनी आपल्या लाडक्या लेकाच्या अंगावर सारी बाळलेणी चढवली आणि गांधीजी व कस्तुरबा यांच्या आशीर्वादासाठी त्याला बाहेर आणले.गांधींनी सिद्धार्थाला वात्सल्याने उचलून घेतले.त्याच्याकडे पहात ते उद्‌गारले, "लहान मुलांच्या सौंदर्याबाबत कुणाला काही कळत नाही हेच खरे," एवढे बोलून त्यांनी सिद्धार्थाला जवळच्या पलंगावर ठेवले आणि त्यांच्या अंगावरून एक एक दागिना उतरविण्याला सुरुवात केली.हे पाहून आपली नापसंती दर्शवीत कस्तुरबा उदगारल्या, "हे काय चालविलंय तुम्ही? या गोड बाळाच्या अंगावरले दागिने काढून टाकणे किती निष्ठुरपणाचे आहे ! छे! त्याच्या अंगावरच राहू देत ते," गांधीजी हसत उतरले,"मी काय करतोय हे तुला समजलेलं दिसत नाही;जरा स्वस्थ बैस आणि नीट पहा."

शेवटी सिद्धार्थाच्या अंगावर एकही दागिना उरला नाही. मग त्याच्याकडे पाहत गांधीजी म्हणाले,"आता किती सुरेख दिसतो हा ! जणू काही एखादा राजपुत्रच!" मग अपणदिवीकडे वळून ते उद्गारले, "हे सारे दागिने या मुलाच्या नावाने देणगी म्हणून मी हरिजन कार्याकरिता स्वीकारीत आहे.अपर्णा,आता तुझी दागिन्याची पेटी आण पाहू." अपणदिर्वीच्या डोळ्यांत अश्रू उभे राहिले. पण त्या मुकाट्याने आत गेल्या आणि आपल्या दागिन्याच्या दोन पेट्या आणून त्यांनी गांधीजींच्या पुढे ठेवल्या.गांधीजींनी त्या पेटीतले सर्व दागिने पाहिले. त्यांतले काही मोठे नग निवडून,त्यांनी त्यांचे वजन आजमावले.मग ते दागिने आपल्यापाशी ठेवून ते म्हणाले, "अपर्णा,तू एका मोठ्या मनुष्याची मुलगी आहेस.हरिजनकार्याला मदत म्हणून तुझे हे दागिने मी घेत आहे.मला तुझं वचन हवंय.मी घेतलेल्या दागिन्यांच्या ऐवजी पुन्हा असले दागिने तू करवून घ्यायचे नाहीस.आहे

कबूल?" अपणदिवींनी तसे वचन दिले;ते दिल्यावर "आपल्या मनावरला एक फार मोठा अनामिक भार नाहीसा झाला,"असे अपणदिवींनी नमूद करून ठेवले आहे.

सामान्य माणसाची भौतिक प्रगती आणि आत्मिक जागृती

दलित,पीडित आणि वंचित मानवतेबद्दल वाटणारे उत्कट ममत्व हा गांधीजींच्या आत्म्याचा स्थायिभाव होता.त्यामुळे आफ्रिकेत काय किंवा भारतात काय, त्यांनी ज्या ज्या चळवळी आणि उपक्रम केले त्यांचे त्यांचे मध्यवर्ती सूत्र एकच होते.उपेक्षित आणि वंचित सामान्य मनुष्याचा उद्धार !

भारतीय स्वातंत्र्यांच्या चळवळीचे दोन तपांहून अधिक काळ त्यांनी नेतृत्व केले;पण राजकीय स्वातंत्र्य हे त्यांच्या दष्टीने अंतिम साध्य नव्हते;या देशातल्या सामान्य मनुष्याचा सामाजिक,आर्थिक आणि सांस्कृतिक पुनर्जन्म घडवून आणण्याचे ते एक समर्थ साधन होते.मात्र हे सर्वस्पर्शी परिवर्तन केवळ बाह्य बदलांनी होणार नाही,सामान्य माणसाची सुप्त आंतरिक शक्ती जागृत व वृद्धिंगत करून तिच्या सहाय्याने हे परिवर्तन घडवून आणले पाहिजे,याचा त्यांना कधीच विसर पडला नाही.सर्व प्रकारच्या आत्यंतिक विषमतेमुळे सत्ताधाऱ्यांच्या,उच्चवर्णीयांच्या आणि धनसंपन्नांच्या पायदळी तुडवला जाणारा मनुष्य तसाच राहू नये म्हणून त्यांनी या सर्वांची पावले जशी रोखून धरली,तशी धुळीत पडलेल्या दुर्बल दलितांना स्वतःच्या हातांनी उठवून त्यांच्या अंगावरील धूळ त्यांनी झटकून टाकली;ताठ मानेने इतरांच्यापुढे उभे राहण्याची त्यांना दीक्षा दिली.भारतीय समाजातल्या अगदी तळाच्या मनुष्यालाही निर्भय,स्वावलंबी आणि जीवनसन्मुख करण्याचे जेवढे निकराचे प्रयत्न गांधींनी केले,तेवढे अन्य कोणीही केले असतील असे वाटत नाही.सामान्य माणसाच्या आत्मबलावर साचलेला राखेचा थर दूर व्हावा,त्या राखेखाली विझत चाललेला स्फुल्लिंग मुक्तपणे चमकावा,त्या ठिणगीला ज्ञानाचे आणि चिंतनाचे वारे लागावे आणि हळूहळू फुलून तिच्यातून खरीखुरी माणुसकी असलेला आणि हक्क व कर्तव्य यांची सारख्याच भक्तिभावाने उपासना करणारा नवमानव निर्माण व्हावा ही गांधीजींची अंतरीची तळमळ होती.केवळ भौतिक समृद्धी माणसास समाधानी ठेवू शकणार नाही हे त्यांनी ओळखले होते. म्हणून एका बाजूने सामान्य मनुष्याच्या भौतिक प्रगतीसाठी आणि दुसऱ्या बाजूने त्याच्या आत्मिक जागृतीसाठी गांधीजी सतत धडपडत राहिले.

एका महामानवाचे ते भव्य स्वप्न होते !

ही धडपड पिढ्यान् पिढ्या चालू राहणे आवश्यक होते. कारण हा काही केवळ क्रांतीने आणि कायद्यांनी नवा समाज घडविण्याचा प्रयत्न नव्हता.दानव बदलू शकतो, त्याच्यातले पशुत्व पुन्हा वर डोके काढणार नाही,असे परिवर्तन त्यांच्यात होऊ शकते,दुर्दम्य श्रद्धेने प्रेरित झालेल्या एका महामानवाचे ते भव्य स्वप्न होते. 

असल्या स्वप्नांच्या साक्षात्काराने झपाटलेली माणसे इतिहासाला अज्ञात नाहीत.आपले स्वप्न सत्यसृष्टीत उतरावे म्हणून ही जगावेगळी माणसे जीवाचे रान करतात.गांधीजींनीही आयुष्यभर तेच केले पण आजच्या सर्वसामान्य मनुष्याकडे आपण पाहू लागलो तर गांधीजींनी वर्षानुवर्षे उराशी बाळगलेल्या स्वप्नांचा चक्काचूर झालेला दिसतो! गांधीजींच्या स्वप्नातला तो माणूस आज भारतातून अदृश्य झाला आहे!

आचार्य दादा धर्माधिकारी यांनी काही दिवसांपूर्वी एका व्याख्यानात 'गांधीजी ज्याचे राष्ट्रपिता होते ते राष्ट्र आज कोठे आहे?" असा परखड प्रश्न विचारला होता. जीवनाच्या सर्वच क्षेत्रांत या दुःखद प्रश्नाचे प्रतिध्वनी पावलोपावली ऐकू येत आहेत.ब्रिटिश सिंहाच्या गर्जनेला भीक न घालणारा भारतीय सामान्य मनुष्य आज नाना प्रकारच्या जुन्या नव्या गंडांनी ग्रासला गेला आहे.त्याला जशी मध्यान्ह काळाची चिंता भेडसावते,तशी आपल्या कच्च्याबच्यांच्या भवितव्याची काळजीही बेचैन करते.पारतंत्र्याच्या काळात ताठ मानेने तुरुंगात पाऊल टाकायला शिकलेला हा माणूस आज स्वराज्यात हुजरेगिरी आणि मुजरेगिरी,भ्रष्टाचार आणि काळाबाजार यांच्याशिवाय आपल्या स्थैर्याला दुसरा आधार नाही असे मानण्याइतका भ्रांतचित्त झाला आहे. टिळक-गांधीजींच्या काळात त्याच्या मनात लुकलुकणारी देशभक्ती आज विझून गेली आहे.त्याग आणि सेवा हे स्वातंत्र्यलढ्याच्या काळात देव्हाऱ्यातले देव होते;पण आज त्यांची किंमत दगडापेक्षा अधिक राहिलेली नाही!

चार तपांपूर्वी दरमहा हजारो रुपये कमावणाऱ्या बॅ.चित्तरंजन दासांसारख्या कायदेपंडितांनी गांधीजींनी कोर्टावर बहिष्कार घालण्याचा आदेश देताच आपली वकिली सोडून दिली.ही गोष्ट आजच्या विशी-पंचविशीतल्या तरुणांना स्वप्नातले राज्यदानाचे वचन खरे करणाऱ्या हरिश्चंद्राच्या कथेइतकीच पौराणिक वाटली तर त्यात नवल कसले ?

१९२० ते १९४७ हा गांधीजींच्या भारतातील कर्तृत्वाचा कालखंड,त्याची समाप्ती स्वराज्यप्राप्तीने झाली.पण या कालखंडात गांधीजींनी सामान्य मनुष्याच्या ठिकाणी जे चैतन्य निर्माण केले होते,जी सामाजिक धर्मबुद्धी जागृत केली होती,तिची स्थिती गेल्या वीस वर्षांत विझत चाललेल्या यज्ञकुंडाप्रमाणे झाली आहे.या कुंडातली राख अजून थोडी ऊन आहे,अधूनमधून ती अंगारा म्हणून लोकांना देता येते,एवढ्यावर बडी बडी माणसे संतुष्ट आहेत!

गांधी नावाचे महात्मा,संपादक रॉय किणुकर,साहाय्यक- अनिल किणीकर,डायमंड पब्लिकेशन्स..

ते चैतन्य आज अस्तित्वात आहे काय ?

शालिवाहनाने मातीच्या बाहुल्यातून लढवय्ये सैनिक निर्माण केल्याची लोककथा आहे.तिचा साक्षात्कार १९२० नंतरच्या काळात भारताला झाला.पोलिसाला घाबरणारी माणसे निधड्या छातीने.

उर्वरित भाग पुढील लेखामध्ये…!!



7/9/26

सर्वोत्तम देणगी / Best gift

अखेर,ओतप्रोत जीवन जगलं,तर तीच खुद्द एक सर्वोत्तम देणगी असते.

चेहऱ्यावर गोंधळलेला भाव असलेला,असा जेसन मागे वळला आणि म्हणाला,मिस्टर हॅमिल्टन,तुम्ही कशाबद्दल बोलताय,मला कळत नाहीये.रेड आजोबांनी सांगितलेले बाराही देणगीचे धडे आपण केले,आणि ते म्हणाले नाही का तेव्हा,की हा शेवटचा महिना ?" मी उत्तर दिलं,"हे बघ,मी रेड स्टीव्हन्सचा मुखत्यार आणि त्याच्या संपत्तीचा कार्यकारी व्यवस्थापक आहे,त्याच्या मृत्युपत्राप्रमाणे एक देणगी त्यातून मिळेल.पण त्यासाठी सर्व अटी पूर्ण कराव्या लागणार आहेत.सगळ्या अटींचा एकटा निर्णयकर्ता या नात्याने मी तुला सांगू शकतो की सर्व अटी अपेक्षेबाहेर पूर्ण झाल्या आहेत."

जेसन गोंधळलेला दिसत होता.तो म्हणाला, "तुम्ही कशाबद्दल बोलताय ते मला कळतच नाहीये...."

मिस् हेस्टिंग्ज मध्येच बोलली,"मला ठाऊक आहे की, तुला वाटलं असेल की,तुझ्याकडून सगळं झालंय.तू माझ्यामागून कॉन्फरन्स रूममध्ये आलास तर सगळ्याचा तुला नक्कीच उलगडा होईल."

आम्ही कॉन्फरन्स रूममध्ये गेलो,आणि थोड्या वेळातच रेड स्टीव्हन्स पुन्हा एकदा व्हिडियो पडद्यावरून आमच्याशी बोलायला लागला.तो म्हणाला,"जेसन,मला तुझा किती अभिमान वाटतो हे तुला सांगायचंय.तुझ्यासाठी मी जी सर्वोत्तम देणगीची योजना करून ठेवली तिची प्रत्येक मागणी तू पूर्ण केलीयेस,आणि तिचा प्रत्येक भाग तुला मिळालाय. तुला जशा आयुष्यात एवढ्या लवकरच्या टप्प्यात सगळ्या बारा देणग्या मिळाल्या,तशा त्या मला मिळायला हव्या होत्या.आता तुला सर्वोत्तम देणगी मिळाली आहे.तुला ती केवळ उपभोगायची नाही तर, प्रत्येक देणगीचा व्यवस्थित तोल राखत जबाबदारीनं तुझं आयुष्य जगायचं आहे.तेव्हा शक्य होईल तेव्हा,ही देणगी दुसऱ्याला सुपूर्द करायची आहे,ही तुझी आणखी एक जबाबदारी असेल.

"तुझ्या आयुष्यात व्हायच्या अशा कौतुकास्पद गोष्टी केवळ बघायला मी नं,तुझ्याबरोबर असायला हवं होतं रे,पूर्ण येन केन प्रकारेण,माझ्या स्वतःच्या पद्धतीनं मला वाटतं मी असेन तुझ्यासोबत.

"जेसन,मी आयुष्यात खूप गोष्टी केल्या,पण त्यातली सर्वात उत्तम गोष्ट म्हणजे ही सर्वोत्तम गोष्ट तुला सुपूर्द करणं.कृपा करून मला शरम वाटेल असं कांही करू नकोस.ही देणगी वाढती आणि फलदायी कर.तुला जी सर्वोत्तम देणगी मिळाली आहे,त्या देणगीमुळे तुझं आयुष्य विस्तारू दे.हे सगळं तू केलंस म्हणजे,तू मला तुझ्या पद्धतीनं त्या सर्वोत्तम देणगीची माझ्यासाठी भर केल्यासारखं होईल.'

रेड स्टीव्हन्सची प्रतिमा मावळली.आता ही शेवटचीच वेळ होती.दिवे लावून उजेड झाला.जेसननं जागच्याजागीच एक उडी मारली.

आणि चेहऱ्यावर आत्मविश्वासपूर्ण भाव ठेवून बोलला,"मी हे करणारच ! सर्वोत्तम देणगीच्या प्रत्येक भागाचा उपयोग करणार.मी एक वर्षापूर्वी जसा होतो,तसे जे लोक आहेत,त्यांना कुठल्या पद्धतीनं हे द्यायचं,हे मी शोधून काढीन.

मला कल्पनाच नव्हती,एखाद्याला सर्वोत्तम देणगी काही द्यायची तर,त्यांच्यापाशी आधीपासूनच ज्या उत्तमोत्तम गोष्टी आहेत त्याची त्यांना जाण आणि जाणीव आणून द्यायची असते."

जेसन पुन्हा एकदा दाराकडे वळला आणि मी त्याला थांबवून म्हटलं,"भल्या माणसा इतक्या घाईनं कधी कोणाला जातांना कधी पाह्यलं नाही मी."

तसेच चेहऱ्यावर गोंधळलेले भाव असलेला जेसन मागे वळला आणि म्हणाला,"सॉरी,मिस्टर हॅमिल्टन,मला वाटलं..

मी मध्येच अडवत म्हणालो,"मला ठाऊक आहे,तुला वाटलं,आटपलं आहे सगळं,तू जर नीट मागे रेलून बसलास तर,मी माझं रेड स्टीव्हन्सच्या मृत्युपत्राच्या संबंधातलं शेवटचं काम करतो."

मिस हेस्टिंग्जनं कागदपत्रांचा मोठा गठ्ठा दिला,आणि मी त्यातल्या योग्य कागदाकडे वळलो.मी माझा वाचायचा चष्मा खिशातून काढत होतो,तेव्हा जेसन पुटपुटला, "मला तर वाटलं..."

मी खोटंखोटं रागावत त्याला अडवत बोललो,"तुला सांगतो,नियुक्त केलेला मुखत्यार जेव्हां त्याचं अखेरचं काम करता असतो,तेव्हा त्याला मध्येच रोखू नये."

मिस् हेस्टिंग्ज हसून म्हणाली,"खास करून मुखत्यार जेव्हा ऐंशी वर्षाचा असतो तेव्हा".

आम्ही सगळे हसलो आणि मी दस्तऐवजातून वाचू लागलो,"आणि मी माझा पुतण नातू जेसन स्टीव्हन्स याला धर्मादाय न्यासाच्या निधीचा नियंत्रक म्हणून नेमतो.त्याची वर्तमानातली किंमत पाच हजार दशलक्ष डॉलरच्या थोडी वरतीच आहे.माझ्या पुतणनातवाने जीवनाच्या सर्व क्षेत्रात जबाबदारीची जाणीव आणि कर्तबगारी सिद्ध केली आहे.त्याला या धर्मादाय न्यासाच्या निधीचा एकट्याला पूर्ण ताबा मिळेल.या न्यासास रेड स्टीव्हन्सचं मुलांसाठी असलेलं आसरा-घर, रेड स्टीव्हन्सच्या वाचनालयाचा उपक्रम,निरनिराळ्या

शिष्यवृत्तींची योजना, रुग्णालयं आणि इतर पुष्कळशा महत्त्वाच्या संस्थांचा समावेश होतो.

"मी जेसनला सर्वोत्तम देणगीधारक म्हणून असं सांगतो की,त्यानं मिळालेलं शहाणपण आणि मिळालेला अनुभव यांचा उपयोग या योजनांचं काम करतांना करावा आणि अशा योजना,ज्या त्याला महत्वाच्या वाटतील,त्या योजनाही त्यानं कराव्यात."

पूर्णपणे बेसावध असलेला जेसन खुर्चीत मागे रेलून बसला होता.बोलायला अडखळत सुरूवात करत शेवटी तो म्हणाला,"या सर्व गोष्टी माझ्या नियंत्रणाखाली असणार असं तुम्हाला म्हणायचंय का ?"

मी त्याच्याकडे औपचारिकपणे पाह्यलं आणि तशाच सुरात बोललो,

"मी जो दस्तऐवज वाचतोय,त्यावरून तसंच वाटतंय. वर उल्लेख केलेल्या सर्व गोष्टी आणि शिवाय तुझ्या मते जे काही महत्त्वाचं आहे,त्या सगळ्याचा कार्यभार तुझ्याकडे आहे."

जेसनचा चेहरा उजळला.त्याच्या चेहऱ्यावर स्मित उमटलं.त्यानं मिस हेस्टिंग्जकडे बघून परत माझ्याकडे पाहिलं,म्हणाला,"सर्वोत्तम देणगी जगभर पोचवण्यासाठी मी या धर्मादाय निधीतला काही भाग वापरणार."

मिस् हेस्टिंग्जनं उत्तर दिलं,"माझं ठाम मत आहे की रेड स्टीव्हन्सच्या मनात एवढा काळ हीच गोष्ट असली पाहिजे."

जेसननं पुन्हा आम्हा दोघांना मिठी मारली,खूप धन्यवाद दिले,आणि तो निघून गेला.

कॉन्फरन्स रूममध्ये मिस् हेस्टिंग्ज आणि मी यश आणि आनंद यात तुडुंब बुडलो होतो.एका वर्षात जेसनमध्ये जे विस्मयजनक परिवर्तन झाले होते त्याचा आनंद दोघांना वाटत होता.

शेवटी,नेहमी कार्यतत्पर असणारी मिस् हेस्टिंग्ज तिची दिवसभराची खूप सारी कामं करायला कॉन्फरन्स रूमच्या बाहेर पडली.मी कॉन्फरन्स रूममध्ये एकटाच उरलो.मला मोह आवरला नाही,आणि मी रेड स्टीव्हन्सची शेवटचा निरोप असणारी व्हिडिओ टेप काढून पुन्हा एकदा पाहू लागलो.

ती संपल्यावर मी त्या रिकाम्या पडद्याला उद्देशून बोललो,"वा मित्रा,आता नक्कीच सरतेशेवटी आपला सहवास संपला.सर्वोत्तम देणगी कार्यक्रमात तू माझा समावेश केल्याबद्दल मला किती धन्य वाटतंय ते तुला सांगावसं वाटतंय,आणि जेसननं ज्या आश्चर्यकारक गोष्टी केल्या आणि करणार आहे त्यापण तुला सांगाव्याश्या वाटताहेत."

कॉन्फरन्स रूममधून बाहेर पडतांना मला ठाऊक होतं की रेडला हे कळलं असणार आणि त्याच्या स्वतःच्या पध्दतीने जेसन बाहेर कसा रहातोय आणि सर्वोत्तम देणगी कशी देतोय हे पण पहात असणार.

लेखक-परिचय

जिम् स्टोव्हॅल अंध असूनही राष्ट्रीय ऑलिंपिक दर्जाचा वेटलिफ्टर आहे.एक यशस्वी गुंतवणूक-ब्रोकर आहे, आणि एक उत्तम परिचालक (आंत्रप्रनर) आहे.नॅरेटिव्ह टेलिव्हिजन नेटवर्कचा तो अध्यक्ष आणि सहसंस्थापक आहे.आपल्या देशातल्या तेरा दशलक्ष अंध आणि अधू दृष्टीच्या लोकांसाठी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी या संस्थेचे आणि दूरदर्शनचे कार्यक्रम उपलब्ध करून दिले जातात.मुळात अंध आणि अधू दृष्टिच्या लोकांसाठी बनवलेले असले तरी,एल.टी.एन.चा देशभर प्रेक्षकवर्ग साठ टक्के असा आहे की,ज्यांना पूर्ण दृष्टि आहे,त्यांना केवळ कार्यक्रमांमध्ये रस वाटतो.

जिम् स्टोव्हॅल "एन्.टी.एन्. शोकेस" या कार्यक्रमाचा यजमान आहे.त्याच्या पाहुण्यांमध्ये कॅथरिन हेपबर्न, जॅक लेमन,कॅरेल चॅनिंग,स्टीव्ह अ‍ॅलन आणि एडी अ‍ॅल्बर्ट यांसारख्या इतरांचा समावेश आहे.नॅरेटिव्ह

टेलिव्हिजन नेटवर्कला एमि अ‍ॅवॉर्ड आणि इंटरनॅशनल फिल्म अँड व्हिडिओ अ‍ॅवॉर्ड यांखेरीज कित्येक या क्षेत्रातले सन्मान मिळाले आहेत.

अमेरिकेत बाराशे केबल वाहिन्या आणि प्रक्षेपण केंद्रे यांच्या मार्फत पस्तीस दशलक्ष लोकांपर्यंत एन्.टी. एन्. पोचलेली आहे.याखेरीज इतर अकरा देशांमध्ये एन्.टी. एन्.दाखवतात.

एन्.टी.एन्.कार्यक्रम नॅरेटिव्ह टीव्ही. कॉम.या संकेतस्थळावरून इंटरनेटवरून जगातले लाखो लोक बघू शकतात.

यू.एस्.ज्युनिअर चेंबर ऑफ कॉमर्सने "दहा विशेष महत्त्वाचे तरूण अमेरिकन्स" निवडले.त्यांत वॉल्ट डिस्ने,ओर्सन वेल्स,चार अमेरिकन अध्यक्ष यांच्या पंक्तीत जिम् स्टोवेलची निवड केली."गुड मॉर्निंग अमेरिका"आणि सी.एन्.एन्.यावर तो दिसला आहे. रीडर्स डायजेस्ट,टी. व्ही. गाईड,आणि टाइम मासिकात त्याच्यावरचं लेखन आलं आहे.यापूर्वीच्या त्याच्या पुस्तकांची नांव अशी - यु डोन्ट हॅव टु बी ब्लाइंड टु सी, सक्सेस सीक्रेट्स ऑफ सुपर अचीव्हर्स आणि द वे आय सी द वर्ल्ड, तसंच त्याचं अगदी अलिकडलं पुस्तक 'द अल्टिमेट गिफ्ट'.अध्यक्षांची कमिटी ऑन ईक्वल ऑपर्च्यूनिटी यांनी जिम् स्टोव्हॅलची एकोणिसशे सत्त्याण्वचा उत्तम परिचालक म्हणून निवड केली. जून दोन हजारामध्ये जिम् स्टोव्हॅलला इंटरनॅशनल ह्युमॅनिटेरियन अ‍ॅवॉर्ड मिळालं आणि तो माजी अध्यक्ष जिमी कार्टर,माजी प्रथम स्त्री नॅन्सी रीगन आणि मदर टेरेसा या दिग्गजांच्या रांगेत बसला.

सर्वोत्तम देणगी,जिम स्टोव्हॅल,स्वाधारित कलासामग्री,

डॉन बिलिंग्ज,अनुवाद - दिशा केळकर

EMBASSY BOOK DISTRIBUTORS

सर्वोत्तम देणगी.१५ प्रकरणव १२६ पानांचे हे पुस्तक आज संपले. आपल्या सर्वांचे शतशः आभार व धन्यवाद.









7/7/26

जहांगीर - विक्षिप्त असूनही लाडका / Jahangir - Beloved despite being eccentric`

चांगलं जीवन जगलेला एखादा मुघल राज्यकर्ता असलाच,तर तो होता बादशाह जहांगीर.त्याच्या नसांतून फारसी,तुर्की,राजपूत रक्त वाहत होतंच,त्याशिवाय दुहेरी 'डिस्टिल्ड' केलेली मदिरा आणि वारुणीचे वेगवेगळे प्रकारही वाहत होते.२८ ऑक्टोबर,१६२७ रोजी वयाच्या ५८ व्या वर्षी तो मरण पावला.त्या महान मोगलांपैकी लष्करी मोहिमांकडे फार कल नसलेला (म्हणजे वैयक्तिक पातळीवर) असा तो बादशाह होता. अर्थात स्वतःच्या प्रख्यात बापाविरुद्ध त्यानं अर्धवट शिजवलेल्या बंडाचं नेतृत्व केलं असलं,तरी एरवी महत्त्वाच्या सगळ्या लढाया खेळण्यासाठी तो लोकांनाच पाठवत होता.हिंसाचाराच्या त्या कालखंडात हे वर्तन म्हणजे 'इज्जतीला ठेच' लागल्यासारखंच होतं.परंतु वारसाहक्काने मिळालेल्या त्या साम्राज्यात जहांगीरने सुखविलास उपभोगणं हे स्थैर्याचं चिह्नच होतं.शेवटी काय,ज्या प्रकारचं आयुष्य तो जगला त्यासाठी वडील अकबर यांनी उत्तम तऱ्हेने मशागत करून दिलेल्या व्यवस्थेत उच्चासनावर तो बसलेला होता म्हणूनच त्याला ते शक्य झालं होतं.त्यामुळेच संघर्ष क्रोधाच्या चटक्यांची कसलीही झळ न लागता कला,

सौंदर्यशास्त्र यांच्या जगात तो खोल बुडू शकला आणि मोठ्या आत्मविश्वासाने सत्ता आणि मुघल साम्राज्याने गाठलेली भव्योदात्त उंची यांचं प्रतिनिधित्व करू शकला.

अगदी आजही 'जहांगीरनामा' हा ग्रंथ वाचणं हा एक मोहमयी प्रकार असतो कारण त्यातून जी प्रतिमा समोर उभी राहते ती एकाच वेळेस लाडावलेला शहजादा, उत्सुक परंतु फारसा ज्ञानी नसलेला कलारसिक,निष्वर बादशाह,भावनाप्रधान पुरुष अशी संमिश्र असते. अकबर आणि तथाकथित जोधाबाई यांना झालेल्या या पहिल्या पुत्राला लाडाने 'शेखू बाबा' म्हणून हाक मारली जायची.त्याच्यावर लहान वयातच दैव मेहेरबान झालं होतं.मात्र वयाच्या अठराव्या वर्षापर्यंत तो मद्याच्या प्रेमात पडू लागला होता.परंतु सुदैवाने त्याचे भाऊ या बाबतीत त्यापेक्षाही वाईट होते.

गणिका महात्मा आणि एक इटालियन ब्राह्मण,भारतीत इतिहासातील अज्ञात कहाण्या,मनू.एस.पिल्लई,अनुवाद - सविता दामले,मधुश्री पब्लिकेशन

त्याची इच्छा नसेल,तर अगदी अकबराचा 'शाही हुकूम'ही त्याला हलवू शकत नव्हता.एकदा काय झालं की,अकबराने त्याला एका मोहिमेचा प्रमुख नेमायचं ठरवलं.तेव्हा हा पट्ट्या दरबारात हजर राहिलाच नाही. त्याच्या त्या बाकीच्या कमनशिबी बंधूपैकी एकाने ती मोहिमेवर जायची जबाबदारी स्वीकारली आणि नंतर दारूच्या धुंदीत कायमचं गुरफटण्याआधी थोड्याफार लढायाही जिंकल्या.

इकडे अकबराने याचा नाद सोडून आपल्या सगळ्या आशा

आकांक्षा जहांगीरच्या मुलावरच केंद्रित केल्या,त्यामुळे शेकडो कटकारस्थानांना उत्तेजन मिळालं आणि आणखी एक शोकांतिकाही निर्माण झाली.

तथापि दारूत स्वतःला बुडवून घेऊन मरण्याइतका 'शेखू बाबा' ऊर्फ जहांगीर दूधखुळा नव्हता.नक्की काय पणाला लागलंय आणि लक्ष्मणरेषा कुठे ओढली पाहिजे हे पटकन समजण्याइतका तो नक्कीच धूर्त होता त्यामुळे त्यानं मनाशी ठरवलं की आपला स्वतःचा कार्यकाळ पूर्ण होण्याआधी,आपल्याला डावलून आपला एकही पुत्र बादशाह बनणार नाही.त्यामुळे मद्यपान चालूच ठेवलं असलं तरी राज्याभिषेक झाल्यानंतर 'पचन चांगलं व्हावं म्हणूनच मी पितो,' असं ढोंग तो करू लागला.मात्र किती मद्य एका वेळेस प्यायचं त्याची सीमारेषा त्यानं आखून घेतली.

तसंच कर्मठ गटाने आपल्या मुलाऐवजी आपल्या बाजूने उभं राहावं यासाठी तो त्यांच्या समोर आपण अकबराहूनही अधिक धार्मिक आहोत,असं तो स्वतःचं चित्र उभं करू लागला.

त्यानंतर बादशाह झाल्यावर मात्र तो एकापेक्षा अधिक धर्मांवर चर्चा करू लागला.त्यामुळे सरतेशेवटी,'हा ख्रिश्चन बनला आहे का' अशा अफवाही पसरू लागल्या होत्या.त्याशिवाय त्यानं स्वतःची काही चित्रं काढून घेतली.त्यांत तो हिंदू देवतांसारखा मांडी घातलेला आणि उघडा बसलेला दिसतो,तेही एखाद्या मुस्लीम बादशाहसारखं वाटत नव्हतं.

गादीवर बसण्याआधीपासूनच जहांगीरला ज्ञानाची ओढ होती.त्याच्या चरित्रकार पार्वती शर्मा लिहितात की, आयुष्यभर तो वेगवेगळ्या वस्तूंचं मोजमाप करण्यात गढलेला असायचा.एखाद्या पीचचा आकार,टरबूजाच वजन किंवा गुहेच्या प्रवेशदाराची मापं इत्यादी. त्याचप्रमाणे त्यानं काही विचित्र,वेगळी दृश्यंही नोंदवून ठेवली आहेत.त्यामुळे एकीकडे त्याचे सेनापती शत्रुभूमीवर जाऊन आग ओकत होते,तेव्हा जहांगीर मात्र पाळलेले करकोचे मीलन कसं करतात ते पाहण्याचा आनंद घेत होता.तो आपल्या शत्रूकडे बघून दुरूनच डरकाळ्या फोडत होता. (मराठे लोक 'अमर्याद मुर्खतेचे प्रतीक' आहेत असं तो म्हणायचा) तर दुसरीकडे घरातच वन्य पशुसग्रह उभारण्यात पैसे गुंतवायचा.त्याला खूश करायचं,तर त्याला वेगवेगळे प्राणी आणून देणं पुरेसं होतं.इंग्रज लोक त्याला मास्टिफ जातीचे कुत्रे भेट म्हणून द्यायचे,मग त्यांना आणण्यासाठी बादशाह पालख्यांची व्यवस्था करायचा.

आणखी एका प्रसंगी कुणीतरी शेळीसोबत राहणारा सिंह त्याला आणून दिला.तर सशाला गिळणारा साप आणि सापाला मारणारा कोळी (स्पायडर) अशा प्रवासात पाहिलेल्या दृश्यांची वर्णनं केली.

जहांगीरच्या काळात कलेची भरभराट झाली. मॅडोनाबद्दल त्याला वाटणारं प्रेम पाहून युरोपिअन लोक हर्षभरित व्हायचे तर आपल्या परंपरांतील प्रतीकं त्याच्याकडे आहेत हे पाहून हिंदू हर्षभरित व्हायचे. त्याशिवाय बादशाहला दिसलेल्या विचित्र गोष्टींचीही चित्रं काढली जात होती. शर्मांनी एका अत्यंत लुकड्या अशा दरबाऱ्याची कहाणी सांगितली आहे.हे दरबारी कल्पनेच्या पलीकडे बारीक होते.त्यांनी आपण दरबार सोडून जातो अशी विनंती केली.त्यावर जहांगीरने त्याला जाण्याची अनुमती तर दिली; पण त्याआधी तुझं चित्र आम्हाला काढून दे आणि मग जा असं सांगितलं. श्रीलंकेहून आलेल्या दरवेशाने त्याला लोरिस हा मर्कटवर्गातील सडपातळ प्राणी आणून दिला होता. तो दिसायला अगदीच भयंकर होता.त्याला पाहून जहांगीरने हुकूम दिला की 'याचं चित्र काढून घ्या'. आणखी एकदा कुणीतरी झेब्रा भेट दिला तेव्हा संशयी स्वभावामुळे त्याला सुरुवातीला वाटलं की हा बहुधा पट्टे रंगवलेला घोडा आहे.परंतु भरपूर वेळा धुवून आणि घासूनही त्याच्या अंगावरले पट्टे काही गायब झाले नाहीत.

खरं सांगायचं तर,जहांगीरला बहुतेक सर्व जिवंत प्राणी आपल्याकडे असावेत असं वाटायचं.फक्त त्याला अपवाद होता तो म्हणजे त्यानं बंदुकीने मारलेल्या प्राण्यांच्या शवातून जे किडे बाहेर रांगत यायचे त्यांचा होता.

जहांगीरच्या नूरजहानशी असलेल्या नात्याविषयी पुष्कळ लिहिलं गेलं आहे;पण तो आणखी स्त्रियांशीही संबंध ठेवून होता.त्याच्या एका बहिणीकडे तो एवढा आकर्षित झाला होता की,त्याच्या पित्याने तिच्या स्तनांतलं दूध त्याला प्यायला लावलं होतं म्हणजे "ती तुला तुझ्या आईसारखी वाटेल." असं त्याचं म्हणणं होतं.जेव्हा त्याला बालपणी स्वतःचं दूध पाजणाऱ्या दाईचं निधन झालं,तेव्हा तिच्या शवपेटिकेची एक बाजू त्यानं स्वतःच्या खांद्यावर घेतली होती.'जहांगीरनाम्या'त राजघराण्यातल्या बऱ्याच स्त्रियांच्या मृत्यूमुळे त्याला झालेल्या दुःखाची बरीच वर्णनं आहेत.

उदाहरणार्थ, त्याची एक राजपूत पत्नी होती.तिनं आत्महत्या करून मृत्यूला कवटाळलं होतं.हा असा जहांगीर बघताना त्याच्यातील असहायता दिसून येते,तर त्याची दुसरी बाजू क्रौर्याचीही होती.एका प्रसंगी त्याच्या शिकारीत व्यत्यय आणला म्हणून एका नोकराला जीव गमवावा लागला होता आणि एका माळ्याने त्याची आवडती झाडं तोडली म्हणून त्याला स्वतःची दोनचार बोटं गमवावी लागली होती.अगदी उच्चभ्रू अभिजनांनाही त्याच्या संतापाचा तडाखा बसत होता एखादा बंडखोर सरदार त्याच्या पुढ्यात येई तेव्हा लोक काय म्हणतील म्हणून नाही,तर मी माझ्या हातांनी त्याचा गळा घोटला असता,असं तो संतापाने म्हणायचा.

सर्व मोगल बादशाहंमध्ये अत्यंत सुखासीन आयुष्य जहांगीरच जगला.त्याच्या आधी आणि त्याच्या नंतर राज्य करणाऱ्या बादशाहंना ज्या समस्यांनी भेडसावलं होतं,त्या समस्या त्याला नव्हत्या. 

सिंहासनावर व्यतीत केलेली बावीस वर्षं त्यानं नानाविध आवडीनिवडी-छंदांत व्यतीत केली.अकबर किंवा दारा शुकोह यांच्यासारखा तो एकाच विषयात खूप लक्ष देत नसला,तरी जे हातात असे त्याच्या तपशिलात मात्र तो खूप खोलवर जायचा. आपण खूपच लक्षवेधी माणूस आहोत असं लोकांना दाखवायचा.म्हणजे नजराणा म्हणून त्याला कुणी रत्नं पाठवली,तर त्यांची परीक्षा करण्याची नजर त्याच्याकडे होती.तर बैलगाडी मोठ्या कौशल्याने चालवून तो एखाद्या राजदूताला थक्क करून टाकायचा.भावी बादशाह शाहजहान यानं केलेल्या दुष्प्रचारामुळे जहांगीर हा 'बाईलवेडा, बदफैली' असं चित्रं रंगवलं गेलं असलं तरी नवनवी माहिती मिळाल्यामुळे आणि जहांगीरनाम्याने दिलेल्या साक्षीमुळे हा माणूस काही अगदीच तसा नव्हता.लोकांचा आवडता विक्षिप्त असला,तरी लक्षात ठेवण्यासारखा बादशाह होता तो.

समाप्त..

`लोकांचा आवडता विक्षिप्त असला, तरी लक्षात ठेवण्यासारखा बादशाह होता तो.`

`तुम्हाला काय वाटतं? विक्षिप्तपणा आणि महानता एकत्र नांदू शकतात का?`

7/5/26

मातृहत्यारा सम्राट नीरो / Matricide Emperor Nero

पूर्वेकडे आपण जरा फिरून आलो.चला पुन्हा रोम शहरी.सीझर मेल्यावर त्याचा एक चुलत नातू गादीवर बसला.त्याचे नाव ऑक्टोव्हियस.त्याने दुसरे त्रिकूट बनविले.अ‍ॅन्टोनी,लॅपिडस व ऑक्टोव्हियस.या त्रिकुटाने सीझर,पॉपे व क्रॅशस यांच्याप्रमाणेच सारी पृथ्वी आपसांत वाटून घेतली.तिघांनाही लूट करण्यास नीट वाव मिळावा म्हणून ही विभागणी करण्यात आली. आपले काम नीट,निर्वेध व सुरळीतपणे चालावे यासाठी काही लोकांना आपल्या मार्गांतून दूर करणे त्यांना भाग होते! त्यांच्या अवकृपेला बळी पडलेल्यांत सुप्रसिद्ध वक्ता सिसरोही होता.सिसरो मारला जावा असे अ‍ॅन्टोनी व लॅपिडस यांना वाटत होते.प्रथमप्रथम त्याला वाचवू इच्छित होता.पण थोड्याशा विचार विनिमयानंतर सिसरोला ठार मारण्याच्या बाबतीत तिघांचेही एकमत झाले.

प्ल्युटार्क लिहितो; "त्या तिघांत झालेल्या कराराच्या अटी पुढीलप्रमाणे होत्या; "सीझर (ऑक्टोव्हियस) याने सिसरोची बाजू सोडावी,लॅपिडसने आपला भाऊ पॉलस याचा त्याग करावा व अ‍ॅन्टोनीने आपला मामा ल्यूसियस सीझर याला सोडावे." अशा रीतीने त्यांच्या मनातल्या क्रोध-द्वेषांनी त्यांची माणुसकी नष्ट केली.कोणताही हिंस्र वन्य पशूसुद्धा माणसाहून अधिक क्रूर व रानटी नसतो, हे त्यांनी जगाच्या निदर्शनास आणून दिले. क्रोधांध माणसाच्या हाती सत्ता आल्यास तो पशूहूनही पशू होतो.

त्या तिघांनी आपापले काटे काढून टाकून शिवाय आणखी शेकडो जणांची कत्तल केली,पण नंतर ते तिघे पुन्हा नेहमीप्रमाणे आपसांत भांडू लागले.त्या तिघांच्या तंट्यांत लॅपिडस केव्हाच मागे पडला व शेवटी मुख्य प्रतिस्पर्धी दोनव उरले.अ‍ॅन्टोनी इजिप्तमध्ये गेला व सीझरप्रमाणे क्लिओपात्रा हिच्या प्रेमपाशात सापडला.

ऑक्टेव्हियसला जिंकण्याचा एक दुबळा प्रयत्न त्याने केला;पण खि.पू. ३१ या वर्षी अ‍ॅक्टियमच्या आरमारी लढाईत त्याचा मोड झाला व ऑक्टोव्हियस रोमचा प्रतिस्पर्धीहीन स्वामी झाला.त्याने "ऑगस्टस" म्हणजे 'मोठा' ही अहंकारी पदवी धारण केली व रिपब्लिकची परंपरा राखण्याच्या ढोंगाआड सर्व सत्ता हळूहळू आपल्या हाती घेतली.तो पहिला रोमन सम्राट झाला.त्याने एक्केचाळीस वर्षे राज्य केले. (ख्रि. पू. २७ ते इ.स. १४). आपण रोमनांचा सम्राट नेता व देव आहोत,अशी घोषणा त्याने केली.त्याचे शरीर म्हणजे जणू देवाचे,त्याचा राहता राजवाडा म्हणजे जणू पवित्र देव मंदिर,अशी त्याची समजूत होती.त्याच्या ठायी उतावीळपणा नव्हता.तो धाडसी व कारस्थानी होता. कोणतेही कपट करायला तो मागेपुढे पाहत नसे.

थॉमस डी क्विन्सी आपल्या 'सीझर्स' नामक पुस्तकात लिहितो, "इतिहासात नमूद असलेल्या कोणत्याही कमालीच्या दुष्टपणाच्या कृत्यांशी तुलनेत कमी पडणार नाहीत,अशी ऑगस्टसची दुष्कृत्ये होती. देवांना खुश करण्यासाठी त्याने एकदा स्वतःच्या हातांनी यज्ञवेदीवर अनेक कैद्यांचा बळी दिला.एकदा एका युद्धानंतर आपल्या सैन्यास पुरेसा पगार देता येत नाही असे पाहून त्याने काही श्रीमंतांस ठार केले व त्यांच्या इस्टेटी सरकारजमा करून सैन्याचा पगार भागविला! मृत्यूशय्येवर असताना आपण आता जगातून जाणार,म्हणून आपली शेवटची स्तुति-स्तोत्रे गावयास त्याने नोकरांना सांगितले.आपण फारच दिव्य व भव्य जीवन जगलो,असे त्याला वाटे.इतकी उदात्त भूमिका केल्यावर पडद्याआड जाण्यास तो तयार होता; पण जाता जाता स्वतःचे पोवाडे ऐकू इच्छित होता.'

ऑगस्टसनंतर टायबेरियस गादीवर आला.त्याने इ.स. १४ ते ३७ पर्यंत राज्य केले.रोमनांच्या मानाने तो काही फार वाईट नव्हता.त्याला 'दारुडा टायबेरियस' म्हणत. जरा अधिक कठोरपणे लिहिणारे इतिहासकार त्याच्या बाबतीत म्हणतात,'तो दारू व रक्त पिऊन मस्त असे.' त्याने काही रक्त सांडले हे खरे.'पण त्या काळाच्या मानाने त्याने सांडलेले रक्त फार होते असे मात्र म्हणता येणार नाही.'इतर सम्राटांप्रमाणेच त्यानेही अनेकांना फाशी दिले.दुसऱ्यांना मारण्यात त्याला आनंद वाटे.पण तुलना केली असता त्याने कमी बळी घेतले,असेच म्हणावे लागेल.आयुष्याचा बराचसा भाग त्याने कॅप्री बेटावर घालविला.हे बेट समुद्रसपाटीपासून एक हजार फूट उंच होते.ज्यांच्यावर त्याची खप्पा मर्जी होई,त्यांना तो तेथील टेकड्यांवरून समुद्रात लोटी व ते दृश्य मजेने पाही.आपला मुख्य प्रधान सेजानस याच्या लहान मुलीला त्याने ठार केले.हीच त्याने केलेल्यांपैकी सर्वांत जास्त दुष्टपणाची व नीचपणाची गोष्ट होय. तो प्रधानही त्या वेळी मारला गेला.त्या लहान मुलीने विचारले, 'एवढ्याशा लहान वयात मी असे काय पाप केले आहे की,त्यासाठी तुम्ही मला ठार मारावे ? पण सम्राटाचा शब्द म्हणजे कायदा होता. अर्थातच तिला उत्तर कोण देणार? तिला तुरुंगात नेऊन गळा दाबून ठार मारण्यात आले!

तरीही टायबेरियस हा प्राचीन सम्राटांतला कमीतकमी दुष्ट सम्राट होता.तो मेल्यावर कॅलिगुला सम्राट झाला. त्याने इ.स. ३७ ते इ.स. ४१पर्यंत, म्हणजे फक्त चार वर्षे राज्य केले; पण या चारच वर्षांत त्याने अनंत क्रूरकर्मे केली. त्याने स्वतःच्या तीन बहिणींवर बलात्कार केला!करमणूक म्हणून तो माणसे ठार करी ! एकदा सर्कशीच्या रिंगणांतील हिंस्र पशूना पुरेसे अन्न नव्हते म्हणून त्याने त्यांच्यासमोर कैद्यांची रांगच्या रांग उभी करून त्यांना पोटभर जेवण दिले!कधीकधी मेजवानीच्या वेळी मेजवानीचाच एक गंमतीचा भाग म्हणून तो आपल्यासमोर लोकांना फाशी देववी ! तलवारीच्या एकाच घावासरशी डोके उडविलेले पाहण्यात त्याला विशेष आनंद होत असे.त्याने एकदा दोघा कॉन्सल्सना घरी जेवणास बोलावले होते.तो एकदम खो खो करून हसू लागला,तेव्हा त्या कॉन्सल्सनी नम्रतेने विचारले,'हसण्याचे कारण काय?' त्यावर त्याने उत्तर दिले, 'डोक्याशिवाय तुम्हा दोघांची धडे कशी दिसतील असा विचार मनात आल्यामुळे मला एकदम हसू आले.'

त्याने खुनाच्या कलेत पारंगत व्हायचे ठरविले व ते शिक्षण पुरे घेतले.लॅटिन इतिहासकार सुएटोनियस लिहितो,"बलिदानार्थ काढलेल्यांच्या वेदना कशा वाढतील,त्या बराच वेळ कशा टिकतील,हे तो नेहमी पाहत असे.तो सांगत असे,असे घाव घाला की,आपण मरत असल्याची जाणीव त्या मरणाच्या मुखी पडणाऱ्यास नीट व्हावी;एक घाव नि दोन तुकडे असे करू नका."

ज्युपीटर देव आपणाशी नेहमी बोलत असतो असे तो म्हणे.रस्त्यातून तो आपला एक कान जरा उंच करून चाले व पुटपुटत चाले.जणू काय देवाशीच आपले संभाषण चालले आहे असे तो भासवी.चंद्राला तो आपली बायको म्हणे.त्याने आपल्या एका घोड्याला चंद्राचा उपाध्याय म्हणून नेमले होते.

थोडक्यात सांगायचे तर तो वेडा होता.त्याच्यात राम नव्हता.त्याच्या या दुष्ट लहरी नष्ट होतील अशी आशा नव्हती.ज्यूलियसपासून नीरोपर्यंत सारेच सीझर वेडे होते,त्यांची वेडेपणाची लहर जणू आनुवंशिक होती! रोमनांनी कॅलिगुलाचे हे वेडेचार चार वर्षे सहन केले.

नंतर मात्र त्यांनी त्याला ठार केले! पुढचा सम्राट कॅलिगुलाचा चुलता क्लॉडियस याने इ.स. ४१ ते इ.स. ५४ पर्यंत राज्य केले.तो रोगट,नेभळट,असंस्कृत व किळसवाणा माणूस होता.हसताना तो तोंडाने एक विशिष्ट आवाज करी,बोलताना अडखळे,रागावला की एखाद्या मूर्खाप्रमाणे वाटेल तसे हातवारे करी.स्वतःच्या मूर्खपणाच्या करमणुकीसाठी त्याने साऱ्या रोमचे जणू सर्कशीत परिवर्तन केले! रोमन लोक त्याच्याकडे सर्कशीतला एक विदूषक या नात्यानेच पाहत.त्याला प्रजेविषयी प्रेम नव्हते व प्रजेलाही त्याच्याबद्दल आदर नव्हता.पूर्वजांप्रमाणे,त्यानेही लोकांस छळण्याचे नाना प्रकार शोधून काढले.जुन्या ग्लॅडिएटर लढाया त्याला फिक्कट वाटत.सम्राटाचे समाधान होण्याइतके मारण-मरण त्यात नसे म्हणून त्या खेळात त्याने अंगावर काटा आणण्यासारख्या आणखी काही प्रकारांची भर घातली.खरोखरच कैद्यांनी भरलेली गलबते टायबर नदीत उभी करण्यात आली व एकोणीस हजार कैदी एकमेकांवर तुटून पडले! ते आपापले प्राण एकमेकांपासून वाचवू लागले.कितीतरी कैदी ठार झाल्यावर ती करमणुकीची लढाई संपली.

तो स्वतःला मोठा खेळाडू समजे.एकदा दोघा ग्लॅडिएटरांनी परस्परांस भोसकून ठार केले तेव्हा त्याने त्यांच्या दोन्ही तलवारींचे नक्षीदार काटे केले;त्या काट्यांनी तो जेवे.जेवताना जणू त्या दोन मृतात्म्यांची तो स्मृतीच करी ! पूर्वीच्या सम्राटांनी आपणाविरुद्ध कट करणाऱ्यांस ठार मारले होते.

क्लॉडियस त्यांच्याही पुढे गेला.त्याच्या मित्रांना पडलेल्या स्वप्नात जे लोक त्याच्याविरुद्ध कट करीत आहेत असे त्यांना दिसे, त्यांनाही तो ठार करी.एखाद्याने जर "माझ्या स्वप्नात अमुक माणूस आला व तो तुमच्याविरुद्ध कट करीत आहे असे मला दिसले" असे सांगितले,तर त्या स्वप्नात दिसलेल्या खऱ्या माणसास लगेच ठार मारण्यात येई. क्लॉडियसच्या मित्रांना आपणास नको असलेले लोक जगातून नाहीसे करण्याला हा फारच सोपा उपाय सापडला होता.

मागील काही पृष्ठांत रोमच्या काही प्राचीन सम्राटांनी केलेल्या अत्याचारांपैकी पाशवी क्रूरतेचे काही प्रकार नमुन्यादाखल दिले आहेत.ते सारे लज्जास्पद आहेतच

पण पुढे नीरोने केलेल्या अनन्वित प्रकारांचा ते प्रकार म्हणजे नुसता प्रारंभच होता.नीरो हा या सर्व तिरस्कारणीय पिशुनांचा अनुकंपनीय मुकुटमणी होता.नीरो हा क्लॉडियसच्या आग्रिप्पिना राणीला तिच्या पहिल्या नवऱ्यापासून झालेला मुलगा. इ.स. ३७मध्ये म्हणजे ख्रिस्ताला क्रॉसवर चढविल्यानंतर चार वर्षांनी तो जन्मला. 

पुढे त्याच्या आईने क्लॉडियसशी लग्न केले व ती रोमची राणी झाली.नीरो तेव्हा अकरा वर्षांचा होता.आग्रिप्पिना ही क्लॉडियसची चौथी पत्नी.त्याने पहिल्या दोघींना सोडचिठ्ठी दिली होती व तिसरीला ठार केले होते.

आपलीही तीच गत होऊ नये म्हणून नीरोच्या आईने या नव्या नवऱ्यालाच विष देऊन ठार केले! क्लॉडियस विषप्रयोगाने मेला तेव्हा नीरो सतरा वर्षांचा होता.तो कायदेशीररीत्या गादीचा मालक नव्हता. कारण,

क्लॉडियसला ब्रिटॅन्निकस नामक औरस मुलगा होता.पण बादशहा कोणास करायचे,हे बादशाही गार्डाच्या हाती असे.ते वाटेल त्याची निवड करीत व सिनेटरांना त्याला मान्यता द्यावी लागे.न दिली तर गार्डाच्या तलवारी तयारच असत! राजा मरताच आग्रिप्पिना आपल्या पुत्राला नीरोला घेऊन बादशाही गार्डाच्या मुख्याकडे बुर्व्हसकडे गेली.ती सुंदर व मोहक होती.तिला पावित्र्याची मुळीच चाड नव्हती.बुर्व्हसला चुंबने देऊन व त्याची चुंबने घेऊन तिने प्रार्थना केली व चुंबनांच्या भरीला प्रत्यक्ष भरपूर लाचही दिली.तिने बुर्व्हसलाया दोन प्रकारांनी पटवून दिले की,गादीवर ब्रिटॅन्निकसपेक्षा नीरोचाच हक्क अधिक आहे.

शेवटी मोठ्या समारंभाने सम्राट म्हणून नीरोच्या नावे द्वाही फिरविण्यात आली.ईश्वराने नेमलेला रोमचा सम्राट म्हणून तो गादीवर बसला.ईश्वराची ही इच्छा रोमनांच्या अनुभवास पूर्णपणे यावी म्हणून त्याने ब्रिटॅन्निकसला विष देऊन ठार केले! आग्रिप्पिनाने क्लॉडियसला नव्हते का ठार केले? सुपात्र मातेचा तो सत्पात्र पुत्र होता.

पाच वर्षेपर्यंत राज्यकारभाराची सूत्रे हाती घेण्याची इच्छा त्याने दाखविली नाही,आई,बुहेस व शिक्षक सिनेका यांना राज्यकारभार चालविण्याची त्याने मुभा दिली.तो आपल्या मित्रांसह भरपूर दारू पित राही,सर्व सुखांचा पेला ओठांना लावून बसे.जवळच्या शेतकऱ्यांच्या डोक्यावरील टोप्यांसारख्या टोप्या घालून व वेश बदलून तो व त्याचे मित्र सर्वत्र भटकत,लोकांना ठोकीत,

बदडीत,यथेच्छ दारू पीत व रस्त्यातून जाणाऱ्या येणाऱ्यांस धरून गटारात फेकीत.असल्या बेताल गुंडगिरीच्या एका संचारसमयी नीरोने एका सिनेटराच्या पत्नीवर हल्ला केला तेव्हा त्याने नीरोला मरेमरेतो मारले.

मानवजातीची कथा,हेन्री थॉमस,अनुवाद - साने गुरुजी

तो एखाद्या सामान्य ठगाप्रमाणे खासगी रीतीने व चोरून असा वागत होता,तोपर्यंत रोम जरा सुरक्षित होते.पण त्याच्या आईला त्याचे हे वर्तन पसंत नसे,राज्याचा कारभार आपल्या मुलाने स्वतः सिंहासनावर बसून हाकावा असे तिला वाटत असे.पण नीरो सुखासक्त असल्यामुळे तिच्या म्हणण्याकडे लक्ष देत नसे. क्लॉडियसच्या मृत्यूपूर्वी त्याची मुलगी ऑक्टेव्हिया हिच्याशी नीरोचे लग्न झाले होते.तो रोम शहराची उपेक्षा करी,तद्वतच पत्नीकडेही लक्ष देत नसे.अ‍ॅक्टे नामक ग्रीक दासकन्येसह तो उघडपणे राहू लागला. आग्रिप्पिना पूर्णपणे निराश झाली.तिने मुलाला परोपरीने विनवून पाहिले,अ‍ॅक्टे हिचा नाद सोडून देण्याबद्दल प्राथून सांगितले,धमक्याही दिल्या;पण कशाचाही उपयोग झाला नाही.राजवाडा कौटुंबिक कलहाची युद्धभूमी बनला.नीरोच्या मित्रांनी व खुशामत्यांनी त्याची बाजू घेतली.ते त्याला म्हणत, "तुझी आई म्हातारी आहे,तिचे काय ऐकतोस? तिच्या हातचे बाहुले नको बनू,असा मागे मागे का राहतोस? स्वतःच्या हाती सत्ता घे.आईचे काहीही चालू देऊ नको." तो मित्रांच्या सल्ल्यानुसार वागू लागला,त्यामुळे मायलेकरांना एकत्र राहणे अशक्य झाले.आग्रिप्पिना राजवाडा सोडून दुसरीकडे राहावयास गेली.

अपुर्ण शिल्लक भाग पुढील लेखामध्ये..!