चांगलं जीवन जगलेला एखादा मुघल राज्यकर्ता असलाच,तर तो होता बादशाह जहांगीर.त्याच्या नसांतून फारसी,तुर्की,राजपूत रक्त वाहत होतंच,त्याशिवाय दुहेरी 'डिस्टिल्ड' केलेली मदिरा आणि वारुणीचे वेगवेगळे प्रकारही वाहत होते.२८ ऑक्टोबर,१६२७ रोजी वयाच्या ५८ व्या वर्षी तो मरण पावला.त्या महान मोगलांपैकी लष्करी मोहिमांकडे फार कल नसलेला (म्हणजे वैयक्तिक पातळीवर) असा तो बादशाह होता. अर्थात स्वतःच्या प्रख्यात बापाविरुद्ध त्यानं अर्धवट शिजवलेल्या बंडाचं नेतृत्व केलं असलं,तरी एरवी महत्त्वाच्या सगळ्या लढाया खेळण्यासाठी तो लोकांनाच पाठवत होता.हिंसाचाराच्या त्या कालखंडात हे वर्तन म्हणजे 'इज्जतीला ठेच' लागल्यासारखंच होतं.परंतु वारसाहक्काने मिळालेल्या त्या साम्राज्यात जहांगीरने सुखविलास उपभोगणं हे स्थैर्याचं चिह्नच होतं.शेवटी काय,ज्या प्रकारचं आयुष्य तो जगला त्यासाठी वडील अकबर यांनी उत्तम तऱ्हेने मशागत करून दिलेल्या व्यवस्थेत उच्चासनावर तो बसलेला होता म्हणूनच त्याला ते शक्य झालं होतं.त्यामुळेच संघर्ष क्रोधाच्या चटक्यांची कसलीही झळ न लागता कला,
सौंदर्यशास्त्र यांच्या जगात तो खोल बुडू शकला आणि मोठ्या आत्मविश्वासाने सत्ता आणि मुघल साम्राज्याने गाठलेली भव्योदात्त उंची यांचं प्रतिनिधित्व करू शकला.
अगदी आजही 'जहांगीरनामा' हा ग्रंथ वाचणं हा एक मोहमयी प्रकार असतो कारण त्यातून जी प्रतिमा समोर उभी राहते ती एकाच वेळेस लाडावलेला शहजादा, उत्सुक परंतु फारसा ज्ञानी नसलेला कलारसिक,निष्वर बादशाह,भावनाप्रधान पुरुष अशी संमिश्र असते. अकबर आणि तथाकथित जोधाबाई यांना झालेल्या या पहिल्या पुत्राला लाडाने 'शेखू बाबा' म्हणून हाक मारली जायची.त्याच्यावर लहान वयातच दैव मेहेरबान झालं होतं.मात्र वयाच्या अठराव्या वर्षापर्यंत तो मद्याच्या प्रेमात पडू लागला होता.परंतु सुदैवाने त्याचे भाऊ या बाबतीत त्यापेक्षाही वाईट होते.
गणिका महात्मा आणि एक इटालियन ब्राह्मण,भारतीत इतिहासातील अज्ञात कहाण्या,मनू.एस.पिल्लई,अनुवाद - सविता दामले,मधुश्री पब्लिकेशन
त्याची इच्छा नसेल,तर अगदी अकबराचा 'शाही हुकूम'ही त्याला हलवू शकत नव्हता.एकदा काय झालं की,अकबराने त्याला एका मोहिमेचा प्रमुख नेमायचं ठरवलं.तेव्हा हा पट्ट्या दरबारात हजर राहिलाच नाही. त्याच्या त्या बाकीच्या कमनशिबी बंधूपैकी एकाने ती मोहिमेवर जायची जबाबदारी स्वीकारली आणि नंतर दारूच्या धुंदीत कायमचं गुरफटण्याआधी थोड्याफार लढायाही जिंकल्या.
इकडे अकबराने याचा नाद सोडून आपल्या सगळ्या आशा
आकांक्षा जहांगीरच्या मुलावरच केंद्रित केल्या,त्यामुळे शेकडो कटकारस्थानांना उत्तेजन मिळालं आणि आणखी एक शोकांतिकाही निर्माण झाली.
तथापि दारूत स्वतःला बुडवून घेऊन मरण्याइतका 'शेखू बाबा' ऊर्फ जहांगीर दूधखुळा नव्हता.नक्की काय पणाला लागलंय आणि लक्ष्मणरेषा कुठे ओढली पाहिजे हे पटकन समजण्याइतका तो नक्कीच धूर्त होता त्यामुळे त्यानं मनाशी ठरवलं की आपला स्वतःचा कार्यकाळ पूर्ण होण्याआधी,आपल्याला डावलून आपला एकही पुत्र बादशाह बनणार नाही.त्यामुळे मद्यपान चालूच ठेवलं असलं तरी राज्याभिषेक झाल्यानंतर 'पचन चांगलं व्हावं म्हणूनच मी पितो,' असं ढोंग तो करू लागला.मात्र किती मद्य एका वेळेस प्यायचं त्याची सीमारेषा त्यानं आखून घेतली.
तसंच कर्मठ गटाने आपल्या मुलाऐवजी आपल्या बाजूने उभं राहावं यासाठी तो त्यांच्या समोर आपण अकबराहूनही अधिक धार्मिक आहोत,असं तो स्वतःचं चित्र उभं करू लागला.
त्यानंतर बादशाह झाल्यावर मात्र तो एकापेक्षा अधिक धर्मांवर चर्चा करू लागला.त्यामुळे सरतेशेवटी,'हा ख्रिश्चन बनला आहे का' अशा अफवाही पसरू लागल्या होत्या.त्याशिवाय त्यानं स्वतःची काही चित्रं काढून घेतली.त्यांत तो हिंदू देवतांसारखा मांडी घातलेला आणि उघडा बसलेला दिसतो,तेही एखाद्या मुस्लीम बादशाहसारखं वाटत नव्हतं.
गादीवर बसण्याआधीपासूनच जहांगीरला ज्ञानाची ओढ होती.त्याच्या चरित्रकार पार्वती शर्मा लिहितात की, आयुष्यभर तो वेगवेगळ्या वस्तूंचं मोजमाप करण्यात गढलेला असायचा.एखाद्या पीचचा आकार,टरबूजाच वजन किंवा गुहेच्या प्रवेशदाराची मापं इत्यादी. त्याचप्रमाणे त्यानं काही विचित्र,वेगळी दृश्यंही नोंदवून ठेवली आहेत.त्यामुळे एकीकडे त्याचे सेनापती शत्रुभूमीवर जाऊन आग ओकत होते,तेव्हा जहांगीर मात्र पाळलेले करकोचे मीलन कसं करतात ते पाहण्याचा आनंद घेत होता.तो आपल्या शत्रूकडे बघून दुरूनच डरकाळ्या फोडत होता. (मराठे लोक 'अमर्याद मुर्खतेचे प्रतीक' आहेत असं तो म्हणायचा) तर दुसरीकडे घरातच वन्य पशुसग्रह उभारण्यात पैसे गुंतवायचा.त्याला खूश करायचं,तर त्याला वेगवेगळे प्राणी आणून देणं पुरेसं होतं.इंग्रज लोक त्याला मास्टिफ जातीचे कुत्रे भेट म्हणून द्यायचे,मग त्यांना आणण्यासाठी बादशाह पालख्यांची व्यवस्था करायचा.
आणखी एका प्रसंगी कुणीतरी शेळीसोबत राहणारा सिंह त्याला आणून दिला.तर सशाला गिळणारा साप आणि सापाला मारणारा कोळी (स्पायडर) अशा प्रवासात पाहिलेल्या दृश्यांची वर्णनं केली.
जहांगीरच्या काळात कलेची भरभराट झाली. मॅडोनाबद्दल त्याला वाटणारं प्रेम पाहून युरोपिअन लोक हर्षभरित व्हायचे तर आपल्या परंपरांतील प्रतीकं त्याच्याकडे आहेत हे पाहून हिंदू हर्षभरित व्हायचे. त्याशिवाय बादशाहला दिसलेल्या विचित्र गोष्टींचीही चित्रं काढली जात होती. शर्मांनी एका अत्यंत लुकड्या अशा दरबाऱ्याची कहाणी सांगितली आहे.हे दरबारी कल्पनेच्या पलीकडे बारीक होते.त्यांनी आपण दरबार सोडून जातो अशी विनंती केली.त्यावर जहांगीरने त्याला जाण्याची अनुमती तर दिली; पण त्याआधी तुझं चित्र आम्हाला काढून दे आणि मग जा असं सांगितलं. श्रीलंकेहून आलेल्या दरवेशाने त्याला लोरिस हा मर्कटवर्गातील सडपातळ प्राणी आणून दिला होता. तो दिसायला अगदीच भयंकर होता.त्याला पाहून जहांगीरने हुकूम दिला की 'याचं चित्र काढून घ्या'. आणखी एकदा कुणीतरी झेब्रा भेट दिला तेव्हा संशयी स्वभावामुळे त्याला सुरुवातीला वाटलं की हा बहुधा पट्टे रंगवलेला घोडा आहे.परंतु भरपूर वेळा धुवून आणि घासूनही त्याच्या अंगावरले पट्टे काही गायब झाले नाहीत.
खरं सांगायचं तर,जहांगीरला बहुतेक सर्व जिवंत प्राणी आपल्याकडे असावेत असं वाटायचं.फक्त त्याला अपवाद होता तो म्हणजे त्यानं बंदुकीने मारलेल्या प्राण्यांच्या शवातून जे किडे बाहेर रांगत यायचे त्यांचा होता.
जहांगीरच्या नूरजहानशी असलेल्या नात्याविषयी पुष्कळ लिहिलं गेलं आहे;पण तो आणखी स्त्रियांशीही संबंध ठेवून होता.त्याच्या एका बहिणीकडे तो एवढा आकर्षित झाला होता की,त्याच्या पित्याने तिच्या स्तनांतलं दूध त्याला प्यायला लावलं होतं म्हणजे "ती तुला तुझ्या आईसारखी वाटेल." असं त्याचं म्हणणं होतं.जेव्हा त्याला बालपणी स्वतःचं दूध पाजणाऱ्या दाईचं निधन झालं,तेव्हा तिच्या शवपेटिकेची एक बाजू त्यानं स्वतःच्या खांद्यावर घेतली होती.'जहांगीरनाम्या'त राजघराण्यातल्या बऱ्याच स्त्रियांच्या मृत्यूमुळे त्याला झालेल्या दुःखाची बरीच वर्णनं आहेत.
उदाहरणार्थ, त्याची एक राजपूत पत्नी होती.तिनं आत्महत्या करून मृत्यूला कवटाळलं होतं.हा असा जहांगीर बघताना त्याच्यातील असहायता दिसून येते,तर त्याची दुसरी बाजू क्रौर्याचीही होती.एका प्रसंगी त्याच्या शिकारीत व्यत्यय आणला म्हणून एका नोकराला जीव गमवावा लागला होता आणि एका माळ्याने त्याची आवडती झाडं तोडली म्हणून त्याला स्वतःची दोनचार बोटं गमवावी लागली होती.अगदी उच्चभ्रू अभिजनांनाही त्याच्या संतापाचा तडाखा बसत होता एखादा बंडखोर सरदार त्याच्या पुढ्यात येई तेव्हा लोक काय म्हणतील म्हणून नाही,तर मी माझ्या हातांनी त्याचा गळा घोटला असता,असं तो संतापाने म्हणायचा.
सर्व मोगल बादशाहंमध्ये अत्यंत सुखासीन आयुष्य जहांगीरच जगला.त्याच्या आधी आणि त्याच्या नंतर राज्य करणाऱ्या बादशाहंना ज्या समस्यांनी भेडसावलं होतं,त्या समस्या त्याला नव्हत्या.
सिंहासनावर व्यतीत केलेली बावीस वर्षं त्यानं नानाविध आवडीनिवडी-छंदांत व्यतीत केली.अकबर किंवा दारा शुकोह यांच्यासारखा तो एकाच विषयात खूप लक्ष देत नसला,तरी जे हातात असे त्याच्या तपशिलात मात्र तो खूप खोलवर जायचा. आपण खूपच लक्षवेधी माणूस आहोत असं लोकांना दाखवायचा.म्हणजे नजराणा म्हणून त्याला कुणी रत्नं पाठवली,तर त्यांची परीक्षा करण्याची नजर त्याच्याकडे होती.तर बैलगाडी मोठ्या कौशल्याने चालवून तो एखाद्या राजदूताला थक्क करून टाकायचा.भावी बादशाह शाहजहान यानं केलेल्या दुष्प्रचारामुळे जहांगीर हा 'बाईलवेडा, बदफैली' असं चित्रं रंगवलं गेलं असलं तरी नवनवी माहिती मिळाल्यामुळे आणि जहांगीरनाम्याने दिलेल्या साक्षीमुळे हा माणूस काही अगदीच तसा नव्हता.लोकांचा आवडता विक्षिप्त असला,तरी लक्षात ठेवण्यासारखा बादशाह होता तो.
समाप्त..
`लोकांचा आवडता विक्षिप्त असला, तरी लक्षात ठेवण्यासारखा बादशाह होता तो.`
`तुम्हाला काय वाटतं? विक्षिप्तपणा आणि महानता एकत्र नांदू शकतात का?`