भारत घडवायचा होता? गांधीजींनी असे उद्गार काढले होते,हा देश आपला आहे,असे गरिबांतल्या गरीब भारतीयाला अभिमानाने म्हणता येईल असा भारत देश मला घडवायचा आहे.असा देश घडविण्यात या साऱ्या गरिबांनाही अधिकार राहील. या देशातील जनतेत उच्च व नीच असा वर्ग राहणार नाही.या देशात सर्व जातीजमाती पूर्ण सलोख्याने एकत्र नांदतील,या भारतात अस्पृश्यतेच्या शापाचा कलंक कुठे दिसणार नाही,मादक पदार्थांच्या सेवनाला स्थान मिळणार नाही.पुरुषांप्रमाणे स्त्रियांनाही समान हक्क मिळतील.माझ्या स्वप्नसृष्टीतला हा असा भारत देश आहे!"
पददलित जनतेचा उद्धार
हिंदूंना परंपरेने जो वारसा मिळालेला आहे त्याचा गांधीजींना अभिमान वाटत होता.त्यांनी हिंदुधर्माला विश्वव्यापी रूप देण्याचा प्रयत्न केला व सर्व धर्मांना सत्याच्या कक्षेत नेऊन बसविले.
हिंदुधर्माला संकुचित स्वरूप देण्यास त्यांनी नेहमीच नकार दिलेला आहे.त्यांनी एकदा लिहिले होते, "भारतीय संस्कृती ही निव्वळ हिंदू,इस्लामी अगर कोणतीही पूर्ण संस्कृती नाही.या सर्व संस्कृतींचा तो एक संगम आहे."त्यांनी आणखी एकदा लिहिले होते की, "जगातील सर्व देशांतील संस्कृतींचे वारे अगदी मुक्तपणे माझ्या घराभोवती वाहात राहावे अशी माझी इच्छा आहे;पण यांपैकी कोणत्याही देशातील वायुगतीने माझ्या भूमीवरील माझे स्थान उडून जाणार नाही याची मी खबरदारी घेईन.परक्यांच्या घरात आगंतुक,भिकारी अगर गुलाम म्हणून राहाण्यास मी स्पष्ट नकार देईन!" आधुनिक विचारधारेचा गांधीजींच्या जीवनावर परिणाम झालेला होता तरी त्यांनी आपल्या भारतीय विचारमूल्यांचे मूळ सोडलेले नव्हते.उलट त्या मुळाला ते निग्रहाने चिकटून राहिलेले होते. भारतातल्याच नव्हे तर जगातील पददलित जनतेशी एकरूप होण्याची,त्यांच्याशी समभावनेने मिसळण्याची गांधीजींची मनोभूमिका होती.पददलित जनतेचा उद्धार करण्याच्या ध्येयवादी भूमिकेने त्यांनी आपल्या जीवनात धर्मालाही दुय्यम स्थान दिले.
"अर्धपोटी असणाऱ्या राष्ट्राला धर्म नसतो अगर त्या राष्ट्राला कसली कला माहीत नसते.लक्षावधी उपाशी लोकांना जी गोष्ट उपायकारक ठरते त्या गोष्टीतच माझ्या डोळ्यांना सौंदर्य दिसते.लक्षावधी लोकांशी बोलू शकेल,त्यांना समजू शकेल अशी कला अगर साहित्य यांची आपणास आज जरूरी आहे."प्रत्येकाच्या डोळ्यांतून वाहाणाऱ्या अश्रुधारा कायमच्या पुसून टाकायची त्यांची महत्त्वाकांक्षा होती.स्वतःवर पूर्ण विश्वास,विलक्षण शक्तीची जोड, प्रत्येकाला स्वातंत्र्य नि समानता मिळवून देण्याचे ध्येय, गरिबांच्या जीवनाच्या दृष्टीने या साऱ्या ध्येयधोरणांचा वापर करायची मनोभूमिका यामुळे लोहचुंबकाकडे लोखंड आकर्षित होते त्याप्रमाणे सर्वसाधारण जनता
गांधीजींकडे आकर्षिली गेली यात आश्चर्य वाटण्याचे कारण नाही.गांधीजी आपल्या धोरणाने भूतकाळाचा भविष्यकाळाशी मेळ घालीत असून सध्याचा जो भयाण वर्तमानकाळ आहे त्याचा केवळ सोपानशिलेसारखा उपयोग करीत आहेत,नि भविष्यकाळातील आशाआकांक्षांचे व जीवनाचे मंदिर उभारीत आहेत असे सर्वसाधारण जनतेला वाटले.
सर्वसाधारण जनतेचीच ही भूमिका होती असे नव्हे तर विचारवंतांचीही हीच भूमिका होती.गांधीजींच्या विचारा
प्रमाणे व मार्गदर्शनाप्रमाणे या विचारवंतांना आपल्या जीवनातल्या सवयी बदलणे जड गेले व या बदलांमुळे त्यांचे मन संभ्रमित झाले,गोंधळले तरी त्यांनी गांधीजींच्या नेतृत्वाला मान दिला.गांधीजींनी आपल्या अनुयायांतच नव्हे तर त्यांच्या विरोधकांतही व ज्या तटस्थ लोकांची मने गोंधळलेली होती,कोणत्या बाजूने विचार करावा हे त्यांना समजत नव्हते,त्यांच्यातही गांधीजींनीच मानसिक क्रांती घडवून आणली.
कारभाराची लोकशाही
गांधीजींची लोकशाही कारभाराची जी कल्पना होती तीमध्ये बहुसंख्य अथवा प्रतिनिधित्व यांना स्थान नव्हते. त्यांची लोकशाहीची कल्पना सेवाधर्म,त्याग व नैतिक मूल्ये यांच्यावर आधारलेली होती.आपण जन्मजात लोकशाहीवादी आहोत असा गांधीजींचा दावा होता. गांधीजी लोकशाहीवादी असोत अगर नसोत,पण लक्षावधी जनतेच्या ज्ञात-अज्ञात अशा आकांक्षांचे ते सारतत्त्व होते.अर्थातच आपण ज्याला लोकशाही भाषेत जनतेचे प्रतिनिधित्व मानतो त्यापेक्षाही गांधीजींचे हे वैचारिक व मानसिक प्रतिनिधित्व जास्त महत्त्वाचे मानता येईल.लक्षावधी लोकांच्या आशा आकाक्षांची गांधीजी म्हणजे प्रत्यक्ष मूर्तीच होय.गांधीजी हे शेतकऱ्यांचे प्रतिनिधी होते अगर त्यांच्या भावनांचे प्रतिबिंब त्यांच्या ठायी दिसत होते तरी ते सामान्य नव्हते.तीव्र बुद्धिमत्ता,शुद्ध भावना,उत्कृष्ट सदाभिरुची, विशाल दृष्टी,मानवतावादी दृष्टिकोन व आपल्या भावनांवर व वासनांवर कब्जा ठेवणारा संन्यस्त, भावनांचे उदात्तीकरण करणारा ध्येयवादी पुरुष, लोहचुंबकाप्रमाणे लोकांना आपल्याकडे खेचून घेणारा माणूस,या दृष्टीने गांधीजींकडे पाहिले तर त्यांना सामान्य शेतकऱ्याची संज्ञा कशी लावता येईल? तरीही ते मनोभावनेने शेतकरी होते.प्रत्येक प्रश्नाकडे पाहायची त्यांची दृष्टी शेतकऱ्याची होती.जीवनातील काही गोष्टींकडे शेतकऱ्याच्याच अंधदृष्टीने ते पाहात होते. भारतदेश हा शेतकरी भारत आहे.
त्यामुळे या भारताला गांधीजी चांगले ओळखत होते.
भारतातील लहानसहान कंपनांचीही त्यांच्यावर प्रतिक्रिया होत होती.भारतातील परिस्थितीचे त्यांना उपजत ज्ञान होते.माणसाच्या मानसशास्त्राचा त्यांचा सूक्ष्म अभ्यास होता.त्यामुळे कोणत्या क्षणी आपण कोणत्याही समस्येबाबत हस्तक्षेप करावा याचे त्यांना ज्ञान होते.वैचारिकदृष्ट्या पाहिले तर गांधीजी विलक्षण रीतीने मागासलेले असल्याचे दिसून येत होते.पण कृतीची वेळ आली की,त्यांच्यासारखा महान क्रांतिकारक अलीकडच्या काळात भारतात झाला नाही असे म्हटले तरी चालेल.त्यांचे अद्वितीय असे व्यक्तिमत्त्व होते. सर्वसाधारण मोजमापाने अगर तर्कशास्त्राच्या ठोकळनियमांनी त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे मूल्यमापन करणे अशक्य होते.आरामखुर्चीवर बसून समाजवादाच्या गप्पा मारणारे समाजवादी लोक गांधीजींना पहिल्या नंबरचा 'प्रतिगामी' समजत असत;पण वस्तुस्थिती अशी होती की,या 'प्रतिगामी' माणसाला भारत म्हणजे काय हे माहीत होते,
भारताचा अर्थ त्यांनी समजून घेतला होता. ते बहुतांशी शेतकरीच होते व ठोकळेबाज धोरणाच्या कोणत्याही क्रांतिकारकाला जे जमले नाही ते गांधीजींनी करून दाखविले.त्यांनी सारा भारत हालवून टाकला.
स्वयंपूर्ण खेड्याचे स्वप्न
गांधीजी प्रतिगामी असोत अगर क्रांतिकारक असोत, त्यांनी भारताचा चेहरामोहरा बदलून टाकला. परिस्थितीने बदललेल्या अवनतीच्या अवस्थेत खितपत पडलेल्या भारतीयांचा त्यांनी अभिमान जागृत केला, त्यांना चारित्र्याचा धडा शिकविला,
सर्वसामान्य जनतेत शक्ती व जागृती निर्माण केली व भारतीय प्रश्नाला जागतिक महत्त्व आणून दिले.गांधीर्जीचे ध्येयधोरण व ते साध्य करण्यासाठी अध्यात्माचा केलेला वापर आपण एकवेळ बाजूला ठेवला तरी त्यांनी अहिंसावाद व सविनय कायदेभंगाचा आपल्या आंदोलनात जो उपयोग केला ती पद्धती म्हणजे गांधीजींनी देशाला व जगाला दिलेली एक अद्वितीय देणगी आहे,असे म्हणता येईल.भारतीय परिस्थितीला त्यांचे ते अहिंसेचे व सविनय कायदेभंगाचे तत्त्व पुरेपूर जुळणारे होते असे म्हणता येईल.
गांधीजींचा जीवनविषयक दृष्टिकोन व आपण ज्याला आधुनिक दृष्टिकोन म्हणतो त्यात मूलभूत मतभेद आहेत ही गोष्ट खरी आहे असे मला वाटते.आधुनिक जगातले वाढते जीवनमान व छानछोकीपणाची वाढती प्रवृत्ती यांचे त्यांना कधी आकर्षण वाटले नाही.कारण या छानछोकीपणामुळे नैतिक मूल्यांचा अपहार होतो असे त्यांचे मत होते.त्यांना छानछोकीपणाचे आयुष्य आवडत नव्हते.कष्टाळू जीवनाचाच मार्ग त्यांना मान्य होता. चैनबाजीच्या धोरणाने लबाडीचा जन्म होतो व सद्गुणांचा लोप होतो असे त्यांना वाटत होते.गरीब श्रीमंतांच्या जीवनपद्धतीत व जीवनविकासासाठी त्यांना प्राप्त होणाऱ्या संधींमध्ये जे महदंतर दिसून येत होते त्याचा त्यांच्या मनावर फार परिणाम होत होता.म्हणूनच त्यांनी स्वतःच्या मानसिक समाधानासाठी,गरीब श्रीमंतांमधील महदंतर कमी करण्यासाठी गरिबांची जीवनपद्धती स्वीकारली,त्यांचा पोषाख अगर अर्धनग्नपणा जाणूनबुजून स्वीकारला,गरीब व श्रीमंत यांच्यात जी अंतराची खोल,विशाल दरी आहे
याची दोन मुख्य कारणे आहेत असे गांधीजींना वाटत होते.पहिले कारण,परकीयांची राज्यसत्ता नि राज्यसत्तेमुळे होणारे रक्तशोषण,
दुसरे कारण, पाश्चिमात्य देशात यांत्रिक युगाने निर्माण झालेली भांडवलशाही,औद्योगिक संस्कृती!या दोन्ही बाबतीत त्यांची प्रतिक्रिया अत्यंत तीव्र स्वरूपाची होती.जुन्या काळातील स्वयंशासित,स्वयंपूर्ण खेड्यांकडे त्यांचे मन वेध घेत होते.त्या जुन्या काळातील स्वयंपूर्ण खेड्यात उत्पादन त्याची विभागणी व त्याचा समतोलपणा त्यांना हवा होता.आजच्याप्रमाणे त्या काळी राजकीय अगर आर्थिक सत्ता केंद्रित नव्हती,विकेंद्रित होती.त्या काळी तेथे विशुद्ध लोकशाहीचा अंमल चालू होता.त्या काळात गरीब श्रीमंतांच्या राहणीमानात फारसे अंतर नव्हते. शहराचे आजच्यासारखे अरिष्ट त्यावेळी नव्हते व जीवनसत्त्वे देणाऱ्या भूमीशी लोकांचा संपर्क राहात होता व उघड्या जागेत लोकांना शुद्ध हवा मिळत होती. जीवनाच्या अर्थाबाबत त्यांच्यात व इतरांत अशा प्रकारे मूलभूत मतभेद होते.अर्थात हे केवळ मतभेद होते.
पण हे मतभेद त्यांच्या भाषेत व प्रत्येक कृतीत प्रतीत होत होते.त्यांच्या निःसंदिग्ध व तेजस्वी भाषेच्या शक्तीचे मुख्यतः
भारतातील व अनेक राष्ट्रांतील धार्मिक,नैतिक शिकवणुकीतच मूळ होते.तेथूनच त्यांना स्फूर्ती मिळत होती.नैतिक मूल्ये अबाधित राहिली पाहिजेत, साध्यासाठी अयोग्य साधनांची तरफदारी केली जाता कामा नये,साध्यासाठी अयोग्य साधनाचे 'समर्थन' झाले, आणि नैतिक मूल्ये राहिली नाहीत तर व्यक्ती व समाज नष्ट होईल,त्यांची अधोगती होईल असे गांधीजींचे आग्रही मत होते.
गांधीजींच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव देशातील जनतेत अनेक बाजूंनी पसरला व त्या प्रभावाचे जनमनावर ठसेही उमटले;पण भारतातील जनतेच्या अंतःकरणात त्यांना नेता या नात्याने पहिल्या दर्जाचे श्रेष्ठ स्थान मिळाले ते केवळ त्यांच्या अहिंसेच्या धोरणाने अगर त्यांच्या अर्थशास्त्रीय सिद्धान्तांनी नव्हे.पारतंत्र्यातून मुक्त होण्याचा भारताचा निर्धार,जाज्ज्वल्य राष्ट्रीयत्व,उन्मत्त सत्तेपुढे नमते घेण्यास पूर्ण नकार,राष्ट्राच्या इभ्रतीला धक्का पोहोचेल असे कोणतेही धोरण स्वीकारण्यास नकार,या जनतेच्या भावनांची मूर्तिमंत प्रतिमा म्हणजे गांधीजी ! भारतातील अनेक लोकांनी शेकडो प्रश्नांच्या बाबतीत जरी त्यांच्याशी मतभेद व्यक्त केले,त्यांच्यावर टीका केली व मतभेदांमुळे ते त्यांच्यापासून दूर झाले तरी भारतीय स्वातंत्र्यासाठी आंदोलनाचा व कृतीचा समय आला त्यावेळी गांधीजींपासून दूर गेलेली माणसे परत आली नि त्यांनी गांधीजींना आपला नेता मानले.नव्हे,गांधीजींना नेता मानणे त्यांना अगदी अपरिहार्य वाटले.
जनतेचा मनोधर्म
गांधीजींनी भारतीय जनतेचा मनोधर्म समजून घेण्याचा प्रयत्न केला तसा भूतकाळात अगर वर्तमानकाळात क्वचितच अन्य नेत्यांनी प्रयत्न केला असेल.गांधीजी भारतातल्या खेड्यापाड्यात सर्वत्र हिंडले व तेथील लक्षावधी लोकांशी त्यांनी संपर्क साधला. इतकेच नव्हे तर तेथील लोकांच्या अंतःकरणाचा त्यांनी ठाव घेतला,त्यांच्या दुःखात ते समरस झाले.त्यामुळेच लक्षावधी लोकांनी त्यांच्यावर प्रेमाचा वर्षाव केला.
भारतदेश नि भारतीय जनतेच्या समस्या यासंबंधी त्यांना कोणती माहिती नव्हती असे नाही.त्यांना इतिहासाबद्दल फारशी आवड नव्हती व इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी त्यांची जरी प्रवृत्ती नव्हती,तरी भारताच्या इतिहासाचे मूळ ते कधी विसरले नव्हते,
भारताच्या प्रचलित राजकीय प्रश्नावर त्यांनी आपले लक्ष केंद्रिभुत केले होते तरी चालू घडामोडींचा त्यांचा चांगला अभ्यास होता.त्या घडामोडींकडे त्यांचे चांगले लक्ष असे. कोणत्याही प्रश्नातील अनावश्यक बाजूकडे दुर्लक्ष करून कोणत्याही प्रश्नातील मुख्य सूत्र अगर प्रश्नाचा गाभा हाती घेण्याची प्रगल्भता त्यांना चांगली साधलेली होती. कोणत्याही प्रश्नाची कसोटी नैतिक मूल्यांनी लावावयाची त्यांची पद्धती होती.ते जो प्रश्न हाताळीत असत त्यावर त्यांची जबरदस्त पकड असल्या.
गांधीजींनी आपल्या आंदोलनाच्या मधल्या काळात कितीही चुका केल्या 'तरी त्यांची युद्धाची जी मूलभूत रचना असते त्यात ते कधी बदल करीत नाहीत',असे बर्नार्ड शॉ यांनी एकदा उद्गार काढले होते.काँग्रेसच्या नेतृत्वाखाली गांधीजींनी जी आंदोलने सुरू केली ती आंदोलने म्हणजे भारत व भारतातील सामान्य जनता यांच्या हितसंबंधांच्या दिशेने त्यांनी पार पाडलेली महान कामगिरी आहे असे म्हणता येईल.त्यांनी राष्ट्रीय पातळीवरून आंदोलन सुरू करून देशातील लक्षावधी पददलित जनतेचे जीवन घडविण्याचा प्रयत्न केला. अनेक प्रकारच्या दडपणांमुळे कोणत्याही प्रकारचा प्रतिकार करण्यास असमर्थ ठरलेल्या जनतेला त्यांनी स्वाभिमानाची जाणीव करून दिली.त्यांनी जनतेला देशातील राजकीय व आर्थिक प्रश्नांबाबत विचार करायची शिकवण दिली.भारतीयांच्या जीवनात गांधीजींनी क्रांतिकारक कार्य केले.वैचारिक दृष्ट्या गांधीजींपेक्षा जास्त प्रगतिपर विचारसरणी असलेले अनेक राजकीय गट त्यावेळी भारतात कार्य करीत होते; पण या गटांचे जमिनीवर पाय नव्हते.ते अंतरिक्षात विहार करीत होते.त्यामुळे जनतेकडून त्यांना प्रतिसाद मिळाला नाही.पण आवश्यक ती परिस्थिती निर्माण करून जनतेची मने कशी काबीज करावीत हे गांधीजींना माहीत होते.
सामान्य असून असामान्य
सोसाट्याचा वारा यावा व त्या वायुलहरीत आपण शुद्ध हवेत श्वासोच्छ्वास करावा,प्रकाशकिरणांच्या झोताने काळोखाचा भेद होऊन आपल्या नेत्रांपुढील अंधकार क्षणार्धात व्हावा असे गांधीजींचे व्यक्तिमत्त्व होते। झंझावाताने सारी उलथापालथ होते तशी गांधीजीच्या व्यक्तिमत्त्वाने लोकांच्या मनाची उलथापालथ झाली! गांधीजी काही कुठून तरी आकाशातून उत्तरले असे नाही.ते सर्वसामान्य जनतेतूनच निर्माण झाले.त्यांनी सामान्यांची आत्मीयतेने लक्ष दिले."किसान कामगारांच्या पाठीवरचे तुमचे ओझे आधी फेकून द्या, त्यांच्या रक्तशोषणावर तुम्ही जगता आहात,दारिद्रय व दुःखे निर्माण करणारी ही समाजपद्धती बदलून टाका, नष्ट करा!"असा गांधीजींनी आम्हांला आदेश दिलेला होता.निर्भयपणा,सत्य व कृती हा त्यांच्या शिकवणुकीचा मूलमंत्र होता.अर्थातच या मूलमंत्राच्या मुळाशी सर्वसामान्य जनतेचे कल्याण करणे हाच हेतु होता. आमच्या प्राचीन ग्रंथांतून आपणास शिकवण मिळाली आहे की,व्यक्तीला अगर राष्ट्राला मिळणारी अमोल देणगी म्हणजे अभय,निर्भयता ! हे निव्वळ शारीरिक धैर्य नसून मनाचे धैर्य आहे! भारतीय इतिहासाच्या उषःकालात चाणक्य व याज्ञवल्क्य यांनी आपणांस असे मार्गदर्शन केले होते की जनतेला पूर्णपणे निर्भय बनविणे हे लोकनेत्याचे परम कर्तव्य आहे.ब्रिटिश राजवटीच्या काळात सारा देश भीतीच्या भावनेने व्यापलेला होता.सर्वसाधारण जनतेची मने दारुण भीतीने जर्जर झालेली होती.सैन्याची भीती,पोलिसांची दहशत,सर्वत्र पसरलेल्या गुप्त पोलिसांच्या जाळ्याची चिंता,अधिकारी वर्गाविषयी वाटणारा धसका,दडपशाही,कायद्यांनी होणारा थरकाप,सावकार व जमीनदारांनी चालविलेला छळ,बेकारी व उपासमार यांनी दुबळ्या झालेल्या मनात निर्माण झालेले भय या सर्व भयभीती विरुद्ध गांधीजींनी आपला निश्चयी आवाज उठविला, "घाबरू नका!"
शांततावादाचा समन्वय
जनतेच्या अंगावर जे भीतीचे वस्त्र पसरलेले होते ते पूर्णपणे नाही तरी बऱ्याच प्रमाणाने बाजूला सारले गेले. खरे म्हटले तर भारतीय तत्त्वज्ञानाच्या संस्काराने आपल्या पूर्वजांनी जीवनाकडे पहाण्याची तशी शांततावादी भूमिका निश्चित केली होती.पूर्णांशाने भारतीय संस्कृतीचा परिपाक असलेल्या गांधीजींच्या जीवनात शांततावादाचा समन्वय झालेला होता.पण ध्येयधोरणाच्या बाबतीत कार्य करताना अलौकिक उत्साह व कृती याबाबतीत त्यांच्याजवळ राक्षसी सामर्थ्य होते असे म्हटले तरी अतिशयोक्तीचे होणार नाहीं.त्यांच्या पायांना तर अखंड गती होतीच.पण इतरांनाही त्यांनी आपल्या पायांच्या गतीबरोबर अखंडित चालायला भाग पाडले.त्यांनी आम्हांला खेड्यात पाठविले.त्यांनी आपल्या असंख्य अनुयायांना खेड्यांत पाठवून जनतेपर्यंत जो नवा संदेश पाठविला त्या संदेशाने सारी खेडी गजबजून गेली.शेतकरी वर्ग अनेक शतकांच्या घोर निद्रेतून थरकाप होऊन जागा झाला.मानसिक समाधानाच्या कवचातून तो बाहेर फेकला गेला.या परिस्थितीचा आमच्या मनावरही दूरवर परिणाम झाला.उपासमारीने होरपळलेला,चिखलाच्या भीतीने बांधलेल्या घरांत दारिद्र्य सहन करीत धरणीमातेची सेवा करणारा शेतकरी प्रथमंच आम्हाला पहायला मिळाला. पुस्तकांपेक्षा या खेड्यांत जाऊन आम्ही भारतीय अर्थशास्त्राचे धडे घेतले.खेड्यांत जाऊन जो भावनात्मक अनुभव आम्ही घेतला त्यामुळे आमच्या जुन्या जीवनमानाकडे वळणे आम्हांला कठीण गेले.स्वातंत्र्य आले.अनेक वर्षे मनात असलेली आमची स्वातंत्र्याची आकांक्षा सफल झाली.आणि हे स्वातंत्र्यही हिंसक मार्गांनी मिळाले नाही.पण स्वातंत्र्यसूर्याच्या उदयानंतर क्षणार्धात देशात काळोखाचे साम्राज्य पसरले! लोकांची डोकी फिरली ! भीती व द्वेषभावनांनी आमची मने आंधळी झाली व आमच्या संस्कृतीने आमच्यावर लादलेली संयमाची सारी बंधने तटातट तुटली गेली! भीतीचे भयानक डोंगर पुढे उभे राहिले व माणसांनी केलेल्या राक्षसी कृत्यांनी आमच्या मनात क्षणात भयाण शून्यता निर्माण झाली! प्रकाश मावळत चालला असे आम्हाला क्षणभर वाटले.पण एक तेजस्वी ज्योत तेवत होती,आजूबाजूला पसरलेल्या काळोखाला भेदून सर्वत्र प्रकाशकिरणे फेकीत होती! या पवित्र ज्योतीचा प्रकाश आमच्या नेत्रांवर पडताच आमच्यातील शक्ती व ज्या आशा लुप्त झाल्या होत्या त्या पुनः जिवंत झाल्या व आम्हाला विश्वासाने वाटू लागले की,क्षणिक संकटांनी आपल्या जनतेची अंतःकरणे व्यापून टाकलेली असली तरी या साऱ्या परिस्थितीवर मात करून आम्हाला मार्गदर्शन करणारा भारताचा तेजस्वी आत्मा अविचल आहे! या भयाण संकटांत गांधीजींच्या अस्तित्वाचा आधार किती महान होता याची तुमच्यापैकी किती जणांना कल्पना असू शकेल? त्यांनी अर्धशतकापेक्षा जास्त काळात देशाची अभूतपूर्व सेवा केली, स्वातंत्र्यकालीन देशाला मार्गदर्शन केले याची आपल्या सर्वांना जाणीव आहे.पण त्यांनी स्वातंत्र्यानंतर निर्माण झालेल्या पाशवी अत्याचाराच्या परिस्थितीत जी देशाची सेवा केली त्या अविस्मरणीय सेवेशी कोणतीच तुलना करता येणार नाही.आपल्या सभोवतालचे जग विनाशाकडे जात आहे,अशा परिस्थितीत एखाद्या प्रचंड खडकाप्रमाणे अगर दीपगृहाप्रमाणे सत्याचा प्रकाश दाखवीत ते निश्चल राहिले.साऱ्या गोंधळात व गजबजाटात त्यांचा शांत आवाज साऱ्यांना योग्य तो मार्ग दाखवीत होता.
चिरस्थायी विजयाकरिता प्रयत्न
गांधीजीनी आपल्या जीवनात भारताखेरीज,भारतातील गरीब व पददलित जनता यांच्याखेरीज अन्य विचार केला नाही.त्यांना मुक्त करणे नि त्यांचे जीवनमान उंचावणे हेच त्यांचे ध्येय होते.देशातील गोरगरिबांना किमान कपडे वापरता येत नाहीत म्हणून गांधीजींनी त्यांच्यासारखे साधे कपडे घालून ते वावरू लागले. देशातील असंख्य अर्धनग्र लोकांप्रमाणे गांधीजी राहू लागले.चिरस्थायी विजयासाठी त्याचा पाया सत्याच्या कठीण खडकावर उभारला पाहिजे असे गांधीजीचे स्पष्ट मत होते.त्यांनी आम्हांला चळवळीची नि राजकीय युद्धाची नवी पद्धती शिकविली,लोकशाहीचा नवा मार्ग दाखविला.राजकारणात सत्य,सद्भावना नि अहिंसा यांचा प्रभाव किती पडू शकतो हे गांधीजींनी प्रत्यक्ष कृतीने सिद्ध केले.भारतातील कोणत्याही नागरिकाचे राजकीय अगर धर्मतत्त्व कोणतेही असले तरी त्याचा मान राखून त्याच्याशी सहकार्य करण्याची अमोल शिकवण त्यांनी आम्हाला दिली.आपण सारे भारतमातेचे पाईक आहोत नि इथेच आपल्याला राहायचे आहे,
इथेच देह सोडायचा आहे!आपण संपादन केलेल्या स्वातंत्र्यात आपण समान भागीदार आहोत! भारतातील असंख्य कोटी जनतेपैकी प्रत्येकाला समान संधी मिळायला हवी,स्वतंत्र भारताला जे काही मिळेल ते समान तत्त्वाने मिळायला हवे.समाजात काही विशेष अधिकार असलेल्या हितसंबंधी लोकांसाठीच गांधीजी जगले नि त्यांनी देह ठेवला असे नाही.तेव्हा गांधीजींनी ज्या धोरणाने नि मार्गाने कार्य केले तसेच आपणास करायला हवे.
गांधीजींनी कसे जगावे नि कसे मरावे याचा मार्ग दाखविला आहे.त्यांनी आम्हाला शिकविलेला हा धडाच आहे.त्यांनी आम्हाला जो मार्ग दाखविला आहे त्या मार्गान त्यांच्याविषयी आदरभाव व्यक्त करून ध्येयसिद्धीकडे जाणे हेच प्रमुख कर्तव्य आहे ! त्यांनी दाखविलेल्या मार्गाने जाऊन आम्ही जीवनात नि मृत्यूतही कर्तव्य करणे यापेक्षा आणखी मोक्ष तो कोणता?
गेल्या अनेक पिढ्यांत जे थोर हिंदू भारतीय होऊन गेले त्यापैकी गांधीजी एक थोर भारतीय होते.आपण हिंदू भारतीय आहोत याचा त्यांना अभिमान वाटत होता. त्यांना आपला भारतदेश प्राणाहून प्रिय वाटत होता. याचे कारण म्हणजे युगानुयुगे भारताने कधीही न बदलणाऱ्या सत्याची कास धरलेली होती,हे होय. ते मूलतः धार्मिक प्रवृत्तीचे होते.त्यांनी स्वातंत्र्य मिळवून दिलेल्या भारताचे ते राष्ट्रपिता होते.तरी कोणत्याही धार्मिक अगर राष्ट्रीय सीमेपुरते त्यांच्या तत्त्वज्ञानाचे क्षेत्र मर्यादित नव्हते.माणसांमाणसामध्ये
धर्माधर्मांमध्ये ऐक्य घडून यावे अशा आंतरराष्ट्रीय दृष्टिकोनाचे ते मानवतावादी होते.
माणसांच्या मनावर व अंतःकरणावर एवढा महान प्रभाव त्यांना कसा गाजवता आला? भावी युगातील लोक त्याला निवाडा देतील त्यांच्या संपन्न व अलौकिक व्यक्तित्वातील काही बाजूंचा त्यांच्या सान्निध्यातील लोकांनी अर्थ लावावयाचा प्रयत्न करायला हवा.
त्यांच्या जीवनातील त्यांचा महत्त्वाचा दृष्टिकोन म्हणजे सत्य. अयोग्य आणि अन्याय्य मार्गाने चांगले साध्य संपादन करता येणार नाही असे त्यांनी सत्याची भुमिका डोळ्यासमोर ठेवून जाहीर केले.सत्याच्या या जाणिवेनेच त्यांनी आपल्या हातून चुका होताच आपण हिमालया एवढ्या चुका केल्या हे त्यांनी जाहीर केले.
अपुर्ण उर्वरित भाग पुढील लेखामध्ये…