* विजय गायकवाड | Vijay Gaikawad

live

नमस्कार आपले स्वागत आहे. मी पुस्तके आणि मित्रांवर पैसे खर्च करतो,माझ्याकडे दगड आणि विटांवर खर्च करण्यासाठी पैसे नाहीत.- रस्किन बाँड.ही थोर माणसं व त्यांचे विचार मला पुस्तकात भेटलीत.ती भेटली आणि त्यांनी सांगितले कि, प्रत्येक दिवशी असं काही तरी करा की,ते तुम्हाला अधिक सुंदर उद्याच्या दिशेने खूप लांबवर घेऊन जाईल."- डोग फायरबाऊ.' सर्वियन कादंबरीकार मिलोराद पावीच यांचे एक वाक्य आहे ते म्हणतात - जोवर जगात पुस्तक वाचणाऱ्या वाचकांची संख्या बंदूकधारी सैनिका पेक्षा अधिक आहे तोवर काळजीच काहीच कारण नाही.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात.पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये.म्हणून अविरतपणे प्रयत्न करणारे मार्गदर्शक, मित्र धावून येतात.प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,डॉ.दीपक शेटे,आ.भरत बुटाले,प्रा.सर्जेराव राऊत,सुभाष ढगे,अनिल फारणे,डॉ.सुधीर सरवदे ,विश्वास खाडे, विनायक पाटील,संजय कुंभार,सतीश खाडे,मनोहर सुर्वे,गणेश खंदारे,तात्या गाडेकर, दादासाहेब गाडेकर, दादासाहेब ताजणे, पुस्तकातील घटना प्रसंग सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील यांनी केलेले आहे. मला लिहिण्याची प्रेरणा देणारी पुस्तके,लेखक,प्रकाशक,मित्र ही जगावेगळी माणसं माझ्या जीवनातील महत्वाचा टप्पा आहेत.... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ.मेघा गायकवाड, चिरंजीव मयान,माझ्या धावण्यातील गुरुवर्य नामदेव बरुरे,लुल्ला शेख मोठी ताई ,लहान ताई जयश्री शिंदे या सर्वांचेच मनापासून आभार व धन्यवाद मॅट्रिक फेल विजय गायकवाड

5/13/26

नवा राज / ... Nava Raj

माणसांपैकी एखाद्या दर्यावर्दी प्रवाशानं एखाद्या निर्मनुष्य बेटावर पोचावं,तशा झुडूप-मुंग्या महासमाज क्षेत्रात पोचल्या.नुकत्याच उपासमारीला सामोरं जाणाऱ्या वारुळाला अमर्याद अन्नाचा खजिनाच सापडला.आणि सुरुवातीला तर झुडूप-वारुळाला इतर वारुळांपासून स्पर्धेचाही त्रास नव्हता.पण माणसांनी झाडांवरून खांद्याच्या उंचीवर लोंबणारी फळं तोडावी, तितकं मुंग्यांना अन्न धरणं सोपं नव्हतं.मुंग्यांच्या भक्ष्याला वेग असतो.त्यांची शरीरं,

त्यांची वागणूक,हे सगळं कोट्यवधी वर्षांच्या मुंग्यांशी आलेल्या संबंधातून उत्क्रांत झालेलं असतं.यातली काही बचावतंत्रं तर माणसांना अ‌द्भुत वाटणारी असतात.

झुडूप-मुंग्यांना ऑरिबॅटिड कोळी भेटले.खरं तर ते कोळी आणि वारूळ यांच्या संकरातून घडल्यासारखे जीव होते.त्यांना कठीण कवचं होती,मुंग्यांच्या जबड्यांनी सहज फोडता न येणारी.

सहस्रपाद किड्यांची वेगळीच कहाणी होती.ते सापडले,पकडता आले,मारता आले,तर भरपूर अन्न मिळायचं.पण त्यांच्या शरीरांच्या प्रत्येक मण्याला चिलखतासारखी कवचं असतात.ह्या कवचांचे पत्रे मागच्या पुढच्या कवचांना बिजागऱ्यांसारख्या सांध्यांनी जोडलेले असतात.त्यामुळे लवचीक असूनही हे जीव चिलखतधारी असतात.बरं, त्यांच्यावर हल्ला होताच ते सायनाईड आणि इतर विषारी पदार्थ शत्रूवर फवारतात ! अशा त-हेनं प्रत्येक कीटक,

अळ्या,किडे आपापली शस्त्रास्त्रं घेऊन हल्ल्यांना तोंड देतात.

मुंग्यांचंच अन्न खाणारे मुंग्यांचे मुख्य स्पर्धक म्हणजे जमिनीवर वावरणारे भुंगे.यांना कवचही असतं,ते विषही फवारतात,मुंग्यांचे तुकडे तोडण्याइतके त्यांचे जबडेही मजबूत असतात,आणि वेळप्रसंगी ते पंख पसरून उडूनही जाऊ शकतात.

तर विषारी नसलेलं.वेगानं पळू न शकणार,जबड्यांनी चावे न घेणारं,आकारानं मोठं,असं अन्न शोधत झुडूप-मुंग्या नव्या क्षेत्रात वावरू लागल्या.खरं तर आसपास संख्येनं भरपूर असायच्या सूत्रकृमी.पण त्या इतक्या लहान असायच्या की मुंग्यांना त्यांना खायची इच्छा होत नसे.वाघ जसा झुरळं किंवा चिचंद्रयांची शिकार करत नाही,तसंच हे.सुरवंट हे मात्र मुंग्यांचं आवडतं अन्न असत.

तर अन्न शोधत झुडूप-कामकरी मुंग्या फिरायच्या.अन्न सापडलं तर रस्त्यावर फेरोमेन-संदेश सोडत वारुळाकडे परतायच्या.भेटणाऱ्या प्रत्येक झुडूप-मुंगीला शिंगांनी स्पर्श करून "चल, अन्न" असा संदेश द्यायच्या.आणि पुरेसं संख्याबळ जमा झालं की भक्ष्य पकडून वारुळाकडे ओढायला सुरुवात करायच्या.

एकदा झुडूप-मुंग्यांना जमिनीत बिळं करून राहणाऱ्या एका नाकतोड्याचं पिल्लू सापडलं.जरी त्या पिल्लाची वाढ पूर्ण झालेली नव्हती,तरी मुंग्यांशी त्याचं प्रमाण माणसांशी गाईचं असतं,तसं होतं.त्याला मारायला डझनभर मुंग्या लागल्या.काहींनी त्याचे पाय धरून ताणले,तर काहींनी त्या ताणण्यानं जिथून चिलखत हटलं त्या भागांना दंश केले,आणि नाकतोडा-पिल्लू मारलं.असंच एका सुरवंटाला मारायला शंभरेक कामकरी आणि वीसेक सैनिक मुंग्या लागल्या.मुंग्यांना सुरवंट कसा वाटला,तर माणसांना देवमासा वाटावा, तसा ! बरं,अन्न सापडलं आणि घरी नेलं,इतकं सरळही नेहमी घडत नसे.एकदा एक मेलेला सरडा सापडला. संपूर्ण वारुळाचं पोट काही दिवस सुखानं भरेल,असं हे घबाड होतं.काही अभिजन-मुंग्यांना ते सापडलं,आणि लवकरच शेकडो इतर कामकरी मुंग्याही गोळा झाल्या.

पण याच वेळी काही आग्या-मुंग्यांच्या गस्ती टोळ्याही येऊन पोचल्या.आग्या मुंग्या चांगल्या लढायच्या, विशेषतः गटागटांनी.त्या झपाट्यानं येतात,आणि गटागटानं हल्ला करतात.तर लवकरच मेलेल्या सरड्याभोवती धुमश्चक्री सुरू झाली.दोन्ही प्रकारच्या मुंग्या कुमक बोलावत होत्या,आणि सरडा-परिसरात दोन्ही प्रकारच्या मुंग्यांचा खच पडत होता.अखेर झुडूप-मुंग्या जिंकल्या,कारण सरडा त्यांच्या वारुळाजवळ होता,आणि आग्या-वारुळाच्या दूर.

आणि झुडूप-मुंग्यांना खूपशा सैनिकांनाही बोलवावं लागलं,वारूळ लहानखुरं,कुपोषित असताना त्यात सैनिक-मुंग्याच नव्हत्या.भरपूर अन्न मिळाल्यावर मात्र राणी-मुंगीनं सैनिकांनाही जन्म दिला होता.

प्रत्येक सैनिक-मुंगी जोरदार युद्ध करू शकत असे.तिचं शरीर मोठं आणि बळकट असे.डोकं मोठं आणि बदामाच्या आकाराचं असे.शत्रूचं चायटिन-चिलखत फोडण्याइतके जबडे बळकट असत,बारीक आणि तेज दातांनी भरलेले.जबड्याच्या सर्वांत पुढच्या भागातला दात कट्यारीसारखा मोठा असे.यानं भक्ष्य किंवा शत्रूला धरून ठेवता येत असे.शरीराचे सांधे चिलखती काट्यांनी संरक्षित असत.आणि सैनिकांचे मेंदू नेहमी युद्धसज्ज असत.शत्रू भेटला,की त्याला चावतानाच सैनिक मुंग्या हवेत "धोका!" असं सांगणारे फेरोमोन्स फवारत.शत्रू सवालाला जबाब देणारा असला,

तर हे धोका-फेरोमोन्स शरीरं जास्त प्रमाणात घडवायची.बरं,सैनिक मुंग्या धोका-फेरोमोन क्षीण प्रमाणात असलं तरी ओळखायच्या.यामुळे एका सैनिक-मुंगीला विरोध झाला,तर लवकरच अनेक सैनिक मुंग्या तिच्या मदतीला यायच्या.धोका संदेश मिळताच सैनिक मुंग्या सर्व परक्या वस्तूंवर हल्ला चढवायच्या. "मेलो तरी बेहत्तर" अशा वृत्तीनं सैनिक मुंग्या लढायच्या.एकदा का झुडूप-वारूळ वेगानं वाढायला लागलं,की त्याला सैन्य उभारायची गरज भासायला लागायची. संख्येनं नगण्य असतानाच जर वारुळानं सैन्यबळ उभं करायचा प्रयत्न केला असता,तर ते जड गेलं असतं. मर्यादित अन्नपुरवठा वाढवण्याची गरज टाळून सैनिक उभारणं,यानं शत्रूना आमंत्रण दिलं गेलं असतं.शत्रूशी लढायला इतकी कमी सेना घडली असती,की पूर्ण वारूळच सहज नष्ट झालं असतं.त्यामुळे आधी अन्नपुरवठा वाढवायला कामकरी पैदा करून मगच सेनेचा विचार करता आला.अर्थात,सुरुवातीला संख्या कमी,सैन्य नाही,या स्थितीत जर हल्ला झाला असता,तरी वारूळ संपलं असतं.पण तो धोका पत्करूनही कामकरी वाढवणंच शहाणपणाचं होतं.नंतरही सैनिक किती उभारायचे,आणि कामकरी किती,हे सतत ठरवावं लागायचं.

जास्त सैन्य उभारलं, तर अन्न कमी पडून वाढ खुंटणार.दुसऱ्या टोकाला सैन्य कमी पडलं,तर शत्रूला सहज वाट मोकळी होणार,पण अनेक पिढ्यांच्या उत्क्रांतीतून वारुळाचा आकार आणि सैनिक कामकरी प्रमाणाचं गणित वारूळ सोडवू शकत होतं.जसं,एकूण संख्या दोनशेच्या जवळ पोचल्यावरच पहिली सैनिक-मुंगी जन्मली.नंतरही संख्या हजाराजवळ जाईपर्यंत सैनिक-मुंग्या घडल्या नाहीत.उन्हाळ्यात जेव्हा वारुळाची प्रजा दहा हजाराला पोचली.तेव्हा मात्र पाचशे सैनिकांची फौज घडली होती.आता वारूळ स्वतःचा जीव वाचवून वाढण्याइतकं सबळ झालं होतं. झाड-देवांचा कोप,किंवा आर्माडिलोंसारखे मुंग्या खाणारे प्राणी येणं,हे सोडता सर्व हल्ले वारूळ परतवून लावू शकत होतं.वारूळ उत्कर्षाच्या या अवस्थेला पोचलं तोपर्यंत त्याचं क्षेत्रही वाढलं होतं.थोडंथोडं करत कामकरी-मुंग्या महासमाज-क्षेत्रात दूरदूर जाऊ लागल्या होत्या.आणि सोबतच वारुळाची एकूण बुद्धीही वाढत होती.ही बुद्धी एकत्रित नव्हती.ती अनेक मुंग्यांमध्ये विखुरलेली होती.काही मुंग्यांना अन्नक्षेत्राचा एक भाग माहीत असायचा,तर काहींना दुसरा,काहींना पाऊस पडताना काय करणं योग्य ठरलं होतं ते आठवायचं,तर काहींना संगोपन दालनं कशी चालवायची ते माहीत असायचं.माणसांच्या मेंदूंमध्ये वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळी बुद्धीची क्षेत्रं असतात,तसाच हाही प्रकार होता.फक्त बाहेरून पाहणाऱ्याला सुट्या मुंग्या दिसायच्या,आणि त्यांच्यातून घडलेला महाप्राणी मात्र उशिरानं लक्षात यायचा.

महाप्राण्याचे वेगवेगळे भाग फेरोमोन संदेशांमधून एकमेकांशी बोलायचे,आणि परिस्थिती पाहून, तिच्याबद्दल विचार करून कृती केली जायची.एकूण पाहता महाप्राणी सुट्या भागांच्या बुद्धींच्या बेरजेपेक्षा बराच जास्त बुद्धिमान होता.भरभराट भोगत असतानाच झुडूप-वारुळाला त्या भरभराटीची किंमतही समजायला लागली.पहिली अडचण जाणवली ती जागेची.

प्रजेची संख्या वाढायला लागली,आणि मूळच्या वारुळात दाटी व्हायला लागली.वारूळ वाढवायला कामकरी-मुंग्या धडपडायला लागल्या.जबड्यात मावेल तेवढा मातीचा कण उचलून वर उघड्यावर नेऊन टाकायला लागल्या.पण जमीन जास्तच भुसभुशीत होती.जराशाही धक्क्यानं छत ढासळायचं.झुडपांची मुळंही वारूळ वाढवण्यात अडथळे आणायची.आणि मुख्य म्हणजे,झुडपांच्या दाट सावलीमुळे मूळ वारुळाजवळ अन्न कमी मिळायचं.अखेर काही मुंग्या बाहेर एखादी मोठ्या वारुळासाठी योग्य जागा मिळते का,ते पाहायला लागल्या.

महासमाज क्षेत्रात जुन्या भुयार-बोगद्यांचं जंजाळ होतं. त्या जंजाळाची वर्षभरात काही पडझडही झाली होती. काही दारं बुजली होती.माती ढासळून काही भुयारं भरून गेली होती.पण झुडूप-मुंग्यांना जंजाळाचे भाग सापडत असायचे.काही भाग नव्या घरासाठी योग्य आहेत,असंही काहींना वाटायचं,मग त्या परत येताना नवी जागा आणि वारूळ यांना जोडणारी वाट फेरोमोन्सनी रेखायच्या.जर भरपूर मुंग्यांना नवी जागा आवडली असेल,तर त्या जागेचा रस्ता भरपूर सुगंधित व्हायचा.जर एखादुसऱ्या मुंगीलाच नवी जागा आवडली असेल,तर वाटेवरच्या खुणा तुटक आणि अस्पष्ट असायच्या.तर अशा त-हेनं वेगवेगळ्या नव्या जागांसाठी मुंग्यांमध्ये मतदान व्हायचं.ज्या जागेला सर्वांत जास्त मतं,

तिच्याकडे जाणारी वाट फेरोमोन-खुणांनी ठळक व्हायची.अखेर उन्हाळा संपल्यावर दोनेक महिन्यांनी नवी जागा शोधणाऱ्यांना एक अत्यंत आकर्षक जागा सापडली.त्या जागेच्या जुन्या महासमाज-जंजाळाचं दार माती कोसळून बंद झालं होतं.

संशोधक-मुंग्यांनी ते मोकळं केलं,आणि आतली रचना तपासली.ती त्यांना आवडून त्या लगबगीनं पुन्हा वारूळ गाठून इतर मुंग्यांना बोलावून घेऊ लागल्या.लवकरच अनेक मुंग्या जाऊन जाऊन वाटेवरच्या फेरोमोन-खुणा रेखीव झाल्या. वारुळाच्या विखुरलेल्या मेंदूनं निर्णय घेतला,"ही जागा छान आहे!" लवकरच मीटरभर खोल उभं भुयार,दर थोड्या अंतरावर आडवी भुयारं,

त्यांच्यात दालनं,असं वारूळ साफ झालं.एखाद्या सापाचा सांगाडा उभा ठेवून पाहावा,तसं हे भूमिगत वारूळ दिसत होतं.उभा कणा आणि आडव्या बरगड्या.

वारूळ बदलण्याच्या प्रत्येक टप्प्यावर कोणत्या ना कोणत्या अभिजन-मुंगीनं पुढाकार घेतला होता. खोदकामाला कामकरी मुंग्या गोळा करायला सुरुवात एखादी अभिजन-मुंगी करायची,

आणि मग इतर मुंग्या कामगार-भरतीला लागायच्या.

एखादा बोगदा एखादी अभिजन मुंगी साफ करायला घ्यायची,आणि मग इतर मुंग्या मदतीला धावून यायच्या.एकूणच कोणतंही नवं काम करायला घेणं,एखाद्या कामाचा वेग वाढवणं, सगळं अभिजन-मुंग्यांच्या पुढाकारानं केलं जायचं.

तर नवी जागा साफसूफ करून घेतल्यावर घर बदलण्याचा कार्यक्रम सुरू झाला.सगळी वाहतूक दिवसाढवळ्या संपवणं निकडीचं होतं,कारण रात्री वावरणाऱ्या शिकाऱ्यांपासून वाचण्याचा झुडूप-मुंग्यांना अनुभव नव्हता.आणि रात्री अधेमधे असण्यात नष्ट होण्याचा धोका होता.सुरुवातीला हलल्या आळशी मुंग्यांना वाहणाऱ्या कामकरी मुंग्या.हो, काम सुरू करणाऱ्या अभिजन-मुंग्या असतात,तशाच आळशी मुंग्याही असतात घाबरट,आणि बऱ्याच टोचणीनंतरच हालचाल करणाऱ्या! तर कामकरी-मुंग्या आळशी-मुंग्यांच्या जबड्यांना जबड्यानं धरून हलकेच ओढायच्या.यानं आळशी मुंग्या आणिकच शांत व्हायच्या.यानंतर आळशी मुंग्यांची शिंगं आणि त्यांचे पाय शरीरालगत सरकवले जायचे,मुंग्या कोषांत असताना असतात तसे. मग कामकरी-मुंगी हे गाठोडं पाठीवर घ्यायची,आणि नव्या वारुळाकडे चालायला सुरुवात करायची.

कोष,अळ्या यांना जबड्यात धरून नेलं जातं,पण नरमाईन,अंडीही अशीच तोंडात धरून नेली जातात. एकूण घर बदलण्यातला मोठा भाग वारुळाच्या आजी आणि माजी सभासदांच्या वाहतुकीचा असतो.यांत सगळ्यात महत्त्वाची सभासद म्हणजे राणी-मुंगी. आपलं अंड्यांनी भरलेलं पोट सांभाळत,संथ गतीनं, घाबरत,राणी हलू लागली.तिच्या अगदी जवळ दाईचं काम करणाऱ्या मुंग्यांचा घोळका होता,राणी इतरांच्या दृष्टीला पडू नये इतका दाट.यांपैकी काही राणीचा जबडा धरून तिला कोणीकडे जायचं ते खुणावत होत्या.इतर सगळ्या मात्र तिला ब्लॅक कॅट कमांडोंची झेड-सुरक्षा देत होत्या.तिचा आकार प्रचंड होता. तिचं वजन कामकऱ्यांच्या जथ्यालाही न पेलण्याइतकं जास्त होतं.पण तिचा संथ प्रवास हा नवं वारूळ गाठण्याचा सर्वांत महत्त्वाचा भाग होता.

एखाद्या सरड्यानं किंवा पक्ष्यानं तिला खायचा प्रयत्न केला असता,कारण ती छान भक्ष्य होती.एखाद्या शत्रू-मुंग्यांच्या सैन्यानंही असा हल्ला केला असता.असा एखादा प्रयत्न यशस्वी झाला असता,तर झुडूप वारुळाची ती मृत्युघंटा ठरली असती.

मुळात राण्या फारदा एकीकडून दुसरीकडे जात नाहीत. झुडूप-राणीचा हा प्रवास मात्र सुरक्षित आणि सुखाचा झाला.अंधार पडायच्या आत राणी आणि तिची बहुतेक प्रजा नव्या जागी स्थिरावली.काही शूर मुंग्या अजूनही फेरोमोन-वाटांवरून मागेपुढे करत होत्या,पण मुख्य काम झालं होतं.गेल्याच वर्षी मरू घातलेलं झुडूप-वारूळ आता या मुंग्यांच्या प्रजातींमधल्या मोठ्यात मोठ्या आकाराजवळ पोचलं होतं.

महासमाज क्षेत्र त्यांना झाड-देवाच्या कृपेनं मिळालं.ते पूर्णपणे व्यापणं झुडूप-वारुळाला शक्य नव्हतं.पण घुबड तलाव परिसरातल्या कोणत्याही वारुळापेक्षा झुडूप-वारूळ मोठं झालं होतं.पुढे काय होणार ते स्पष्ट होतं.पुढचा वसंत सुरू झाला, आणि मूळ वारुळापासून सर्वांत दूर जाणाऱ्या झुडूप-मुंग्यांना परक्या मुंग्या भेटू लागल्या.दर भेटीनंतर दोन्ही बाजूंच्या मुंग्या पुन्हा आपापल्या घरांकडे पळायच्या.झुडूप-मुंग्या तर फारच आश्चर्यचकित असायच्या,कारण त्यांना आपल्यासारख्या पण वेगळा वारूळ-वास असलेल्या मुंग्या माहीतच नव्हत्या !

नंतरच्या काही दिवसांमध्ये झुडूप वारुळाच्या मुंग्यांनी शत्रू दिसले होते त्या भागातली गस्त वाढवली.त्या बाजूला जाणाऱ्या वाटांवर जास्तजास्त फेरोमोन-खुणा सोडल्या गेल्या,नेमकं हेच सगळं शत्रूच्या बाजूनंही होत होतं.दोनही वारुळं तयारीत होती.

वारुळ पुराण',माधव गाडगीळ',ई.ओ.विल्सन,अनुवाद - नंदा खरे,मनोविकास प्रकाशन 

मग सामने होऊ लागले.कामकरी मुंग्या पोटं फुगवून, पाय ताठ करून सैनिक असल्याचा आव आणू लागल्या.खड्या-काड्यांवर चढून उंची वाढवू लागल्या. यामागनं खऱ्या सैनिक मुंग्या आल्या.मिरवणं, एकमेकींभोवती वर्तुळं रेखणं,धक्के देणं,सगळे स्पर्धा सामन्यांमधले प्रकार होऊ लागले.दोन्ही बाजूंनी थेट हल्ल्याची तयारी मात्र नव्हती. दुसऱ्या बाजूच्या मिरवण्यातून कुठे कमकुवतपणा दिसतो का,यावर मात्र दोन्ही बाजू लक्ष ठेवून होत्या.एक अदृश्य सीमा आखली गेली,म्हणू या.याला फार महत्त्व नव्हतं.झुडूप-वारुळाची राणी तरुण होती.वारुळातली मुंग्यांची संख्या सरासरी वारुळांमधल्या संख्येपेक्षा जास्त होती.वारुळाचं क्षेत्र सुपीक होतं.ताकद,टिकाऊपणा यांना कोणता तात्कालिक धोका नव्हता.नंतरच्या उन्हाळ्यात झुडूप-वारूळ राजकुमारी आणि नर पैदा करू लागलं.योग्य वेळी,योग्य हवामानात राजकुमारी आणि नर उड्डाण करून संभोग करू लागले.मूळ क्षेत्राबाहेरही झुडूप-वारुळातल्या राजकुमारी पोचून,राण्या होऊन वारुळं वसवू लागल्या. झुडूप-वारूळ या महाप्राण्याला पिल्लं व्हायला लागली. उत्क्रांतीच्या खेळात झुडूप-वारूळ यशस्वी ठरलं.

वारुळाच्या एकत्रित मनाला आपण कसे घडलो, कशामुळे यशस्वी झालो,हे पूर्णपणे कळत नव्हतं.सर्वांत वयस्क मुंग्यांना पूर्वीचे शत्रू आठवत होते.ते एकाएकी मेले,नाहीसे झाले,हे आठवत होतं.एक सुपीक आणि विस्तृत क्षेत्र आपल्याला एकाएकी मिळालं,हे स्मरत होतं.या वयस्क मुंग्यांनी त्यांच्या तरुण सहकाऱ्यांसोबत हे क्षेत्र तपासलं होतं.त्या सगळ्यांच्या स्मरणात मिळून क्षेत्राचा एक नकाशाही होता.त्यांना जर हलत्या झाड-देवांचं अस्तित्व जाणवलं असतं,समजलं असतं, तर त्यांना आपल्या सौभाग्याचं कारण कळलं असतं. वादळं,वणवे,तसे झाड-देवही झुडूप-वारुळाला अनाकलनीय होते.

समाप्त—

5/11/26

टिबुकली / Tibukli

(परिचय : टिबुकली आकारानं कबुतराएवढी.गुबगुबीत.भुरा रंग.पोट कोशा रंगाचे.लहान टोकदार चोच.बिना शेपटीचा पाणथळ पक्षी.विणीच्या हंगामात डोके व मान गडद उदी तांबूस रंगाची.पंखांचा रंग तांबूस पिंगट.नर व मादी दिसायला सारखेच.झिलाण,तळी व बोडीतील पाणवनस्पतीत जोडीने अथवा थव्याने राहतात.नवेगाव तळ्यात पाहिलेल्या एका टिबुकली पक्ष्याच्या जोडीची ही कथा.)

उन्हाळा आला की नवेगाव बांध तळ्याकाठची हिरवीगार वनस्पती सुकू लागे.दिवसादिवसाला पाणी आटू लागे.पाणी आटलं की काळ्याभोर गाळाची जमीन उघडी पडे.सूर्याची प्रखर किरणं तळ्याच्या पृष्ठावर पडत.

त्याकडे पाहवत नसे. परावर्तित प्रकाशानं डोळे दिपून जात.अशा ह्या तापलेल्या उन्हात आठवण व्हायची ती श्रावण महिन्यातील हिरवळीची. पावसाच्या शिडकाव्याची.आणि पाहता पाहता चातकांचे थवे उंच आकाशातून पंख फडफडवीत उडताना आढळू लागायचे. त्यांचा टाहो रात्री-अपरात्री कानावर पडू लागायचा. आकाशही ढगांनी भरलेलं असायचं.आता लवकरच पावसाळा सुरू होणार याची खात्री पटायची.

अन् खरचं.पावसाला सुरुवात व्हायची.रात्री मी अंगणात उघड्यावर झोपलेला.वाऱ्यावादळासह पाऊस बरसायचा.मी अंगावर डोक्यापर्यंत पांघरुन घेऊन झोपी जायचा.अंगावर पावसाचे शितोंडे पडत.थोड्याच वेळात पांघरूण ओलं होई. अंगाला गार स्पर्श होई. पाऊस पडला की काळ्याभोर जमिनीतून हिरवे तृणांकुर बाहेर येऊ लागायचे आणि पाहता पाहता सारा आसंमंत हरित दिसू लागायचा.खिडकीजवळीच्या पलंगावर झोपून मी पावसाची शोभा पाही.त्याचा साद ऐकी.अन् साद ऐकता ऐकता श्रावणमास सुरू होई.

तळ्याचा काठ पुन्हा हिरवागार दिसू लागे.त्यातून पाणी डोकावू लागे.बेटासारख्या दिसणाऱ्या घरट्यात टिबुकली बसलेली असे.उंच वाढलेलं देवधान तिच्या घरट्यावर झुकलेलं असे.हिरव्या गादेतून थंडगार वाऱ्याची झुळूक वाहात असे.रानफुलं फुललेली असायची.वनस्पतींचा मंद मधुर गंधही सुखावून जाई.चंडोल पक्षी आनंदानं गात आकाशातून उडत असायचे रंगीबेरंगी मनोल्या चिवचिव करीत गात असायच्या.नाचऱ्या आपल्या शेपटीचा पंखा करून देवधानात नाचत नाचत गात असायच्या.

टिबुकली मात्र अजूनही घरट्यातील पाच अंड्यांवर बसलेली असायची.त्यांना घोळत असायची.मग पाठीवर मान विसावून डोळे मिटून स्तब्ध बसलेली दिसायची.

काही हातांवर जोडीदार तिचं संरक्षण करीत पोहत असायचा.माझ्या पायांची चाहूल लागताच धोक्याची सूचना देणारा आवाज काढायचा.मादी सावध व्हायची.

मोठ्या घाईनं चोच व पायांनी गवतपाला टाकून अंडी झाकी.लगेच ती पाण्यात उतरायची. डुबी मारून पोहत दूर जायची.बेटावरचं घरटं एखाद्या गवताच्या ढिगासारखं वाटे.अंडी तर अजिबात दिसायची नाहीत.मी दुर्बिणीतून काठावरून त्यांच्याकडेच पाहात असतो.यांचंही सारं लक्ष माझ्याकडेच असतं.मी दूर जाण्याची ते वाट पाहात असतात.मी दूर जातो.लपणात बसून त्यांच्याकडे पाहू लागतो.एकानं पाण्यात बुडी घेतली. घरट्याजवळ तरंग उठले.अन् थोड्याच वेळात चिमुकली मान दिसली.

त्यानंतर चेंडूएवढं तिचं शरीर वर आलं.थोडा वेळ तिनं आजूबाजूला जलविहार केला,अन् लगेच बेटावरील घरट्यात उडी घेतली.अंड्यांवरचा केरकचरा बाजूला सारला.पुन्हा अंड्यांची जुळवाजुळव केली,अन् त्यावर बसून ती अंडी उबवू लागली.पुन्हा बेटाभोवती तरंग उठले.तेवढ्यात घरट्याच्या काठावर उदी तांबूस रंगाचं डोकं दिसू लागलं.त्याच्या चोचीत चारा होता.मादीनं मान लांब करून हळूच तो प्रेमानं दिलेला घास चोचीत घेतला.तशी त्यानं पुन्हा बुडी घेतली.आपलं शरीर पाण्याखाली ठेवून नर मादीला भरवीत होता.

जंगलाचं देणं,मारुती चितमपल्ली,,साहित्य प्रसार केंद्र, सीताबर्डी,नागपूर

जवळजवळ वीस एकवीस दिवस हे नरमादी आळीपाळीनं घरट्यातील अंडी सतत उबवीत होते.मध्ये वारं वादळ व पाऊस येऊन गेला.अन् शेवटच्या दिवशी पाच काळीभोर चेंडूएवढी मखमली पिलं बाहेर आली.

अंगावर पांढरे ठिपके असलेली.त्या दिवशी सूर्याची कोवळी किरणं घरट्यावर पडली अन् आईच्या उबेतून बाहेर पडलेली काळ्या मानेची पाच पिलं मला दिसली.जवळच असलेल्या नरानं त्या पिलांना पाहिलं.नर दिसताच मादीनं घरटं सोडलं आणि ती नरासोबत पाण्यात उतरली.आता ती दोघं बेटाभोवती हळूवार आवाज काढीत पोहू लागली.ती त्यांना साद घालत होती.अन् ती बावरी पिलं त्यांच्याकडे धावली.धावताना पाण्यात पडली अन् लगेच पोहू लागली.दुसऱ्या दिवसापासून ती स्वतःच पाण्यात बुडी घेऊ लागली.पण लगेच ती पाण्यावर यायची.

घरट्यापासून दूर जाऊ लागली की ती आईची पिसं चोचीनं धरून तिच्याबरोबर तरंगत असायची.

काही दिवसांनी आई त्यांना उडणाऱ्या माश्या कशा पकडाव्यात,देवधानावर,बसलेले कृमिकीटक कसे टिपावेत, पारळाचं बी कसं खावं याचे पाठ देऊ लागली.

एकदा तिनं असंच पिलांना मासेमारीसाठी पाण्यात आणलं. ती छोटा मासा चोचीत पकडून त्यांच्यासमोर पुन्हा पाण्यात टाकायची. पिलं माशाला पकडू शकली नाहीत तर थोड्याच अंतरावर गेलेल्या त्या माशाला ती पुन्हा पकडायची. त्यांच्यासमोर तो टाकायची आणि तो त्यांना पकडायला लावायची. अशा रीतीनं पिलं मासे पकडण्यात प्रवीण होईपर्यंत ती त्यांना सतत मासे । पकडण्याचे पाठ देऊ लागली.त्या पिलांना पाण्यात तरंगण्यात मोठी मौज वाटू लागली,नुकतीच अंड्यांचं कवच फोडून बाहेर आलेली ती पिलं,पण आता त्यांना आभाळाचं कवच अपुरं पडू लागलं. त्यांना स्वैर व स्वच्छंद विहार करण्यात अपूर्व आनंद मिळू लागला.

त्यांना जगाचा काहीच अनुभव नव्हता.त्यांना माहीत नव्हतं की हे जग सुखदुःखानं भरलेलं आहे.त्यांना अनेक रहस्ये अजून समजायची होती.अल्लड अन् अजाण पिलांना संकटांची जाणीवही नव्हती.पण त्यांच्या अवतीभोवती संकटेच संकटे होती.सर्वत्र शत्रूच शत्रू होते.म्हणून नरमादी दोघंही अगदी सावधचित्त होते.जरा कुठं खुट्ट झालं की नर धोक्याची सूचना देई.सूचना मिळताच मादी आणि पिलं पाण्यात बुडी मारायचे.

ढांगोळ्या पायाचा सुकाणू करून ती आईजवळ पोहोचायची.एकामागून एक ते मखमली पाच गोळे तिच्या पाठीवर आरूढ व्हायचे.ती त्यांना आपल्या पंखात घ्यायची अन् पिलांसकट पाण्यात बुडी मारायची, त्यांना देवधानात लपविण्यासाठी.

श्रावणात क्षणात ऊन पडतं तर क्षणात पाऊस.जिकडे तिकडे पाखरांचं संगीत सुरू असतं.जलवनस्पतींना फुलांचा बहार आलेला असतो.पिलंपण दिवसा दिवसानं वाढत असतात. आता ती मातापित्यांपासून दूर जातात.

स्वतंत्रपणे नाचू बागडू लागतात.पण त्यांना आजूबाजूच्या संकटांची जाणीव नसते.एका सकाळी ते सारं पक्षिकुळ शांत पाण्यात चरत चरत जलविहार करीत होतं.इतक्यात नरानं धोक्याची सूचना दिली.पाहता पाहता एक शावक पाण्याखाली दिसेनासं झालं.हुदाळ्यानं ऑटरनं-त्याला आत ओढलं होतं. काही तरंग दिसले. ते उत्तरोत्तर वाढत होते अन् देवधानात विरून जात होते.

पिलं मोठी झाली.ती स्वतःची काळजी घ्यायला आता समर्थ झाली होती.एक दिवस मादी सतत पाण्यात डुंबत होती.वर येत होती.पाहिलं तर ती पुन्हा घरटं बांधत होती.तिनं अंडी घातली.एका महिन्यानंतर पुन्हा चार पिलं दिसली.आता पूर्वीची ती मोठी झालेली पिलं आपल्या भावंडांची काळजी घेत त्यांना वाढविण्यात मातापितरांना साहाय्य करीत होती.

समाप्त...



5/9/26

तरुण मुलीची सत्यकथा / True story of a young girl

व्हेन आय फेल फ्रॉम द स्काय' हे पुस्तक ज्युलियन कोपेक डिलर यांनी लिहिलं ते २०११ साली.म्हणजे अपघातानंतर तब्बल ४० वर्षांनी.हे पुस्तक केवळ त्यांच्या जंगलातल्या ११ दिवसांच्या अनुभवांचंच नव्हे,तर त्या काळात त्यांच्या मनात घडलेल्या खळबळींची आणि या घटनेनंतरच्या त्यांच्या आयुष्याचीही कहाणी सांगतं.

तिथल्या पक्ष्या प्राण्यांच्या अभ्यासासाठी आपण आयुष्यभर काम करायला हवं.तोच आपल्या आयुष्याचा अर्थ असू शकतो याची जाणीव तिला या प्रवासात होते. ज्युलियनचा हा प्रवास जसा मृत्यूकडून जीवनाकडे चाललेला असतो तसाच तो जगण्याचा अर्थ शोधण्याच्या दिशेनेही सुरू होतो हे विशेष.

जिथे तू अडकली होतीस त्या जंगलाचं पुन्हा तोंडही पाहू नये असं वाटणं साहजिक नाही का,असा प्रश्न पुढे ज्युलियनला अनेकदा विचारला गेला.तिला अर्थातच तसं कधीही वाटत नाही.उलट,अशा खडतर जीवन-मरणाच्या प्रसंगी माणसांच्या प्रतिक्रिया आपण मानतो तशा एका साच्यातल्याच नसतात,हेच ज्युलियनची गोष्ट आपल्याला सांगते.

एकीकडे ज्युलियनच्या मनात स्वतःच्या हिमतीवर बाहेर पडण्याची इच्छा कायम असली तरी तिची शक्ती मात्र कमी कमी होऊ लागलेली असते.त्यातच आणखी एक समस्या डोकं वर काढते.

तिच्या खांद्याजवळ एक जखम झालेली असते.

अधूनमधून मान मागे वळवून ती जखम तपासण्याचा चाळा ज्युलियनला लागलेला असतो. एकदा तिच्या लक्षात येतं की त्या जखमेत अळ्या वळवळताहेत.

बहुतेक एक प्रकारच्या माश्यांनी त्या जखमेत अंडी घातलेली असतात आणि त्यातून अळ्या बाहेर आलेल्या असतात.ती जखम डोळ्यांसमोर नसल्यामुळे त्या अळ्या काढणं ज्युलियनसाठी अतिशय अवघड असतं.मान तिरकी करून एका काटकीचा चिमटा तयार करून ती त्या अळ्या काढण्याचा प्रयत्न करते;पण काटकीचा स्पर्श झाल्यावर त्या पुन्हा जखमेच्या आत गायब होतात.

ज्युलियनच्या घरच्या कुत्र्याच्या जखमेतही अशाच अळ्या झाल्याचं तिला आठवतं.तेव्हा त्याच्या जखमेवर केरोसीन टाकून त्या बाहेर काढलेल्या असतात.पण इथे तिच्याकडे ना केरोसीन असतं ना आणखी कुठलं औषघ.त्यामुळे वेळ मिळेल तेव्हा काटकीने डिवचून त्या एकेक करून बाहेर काढण्याशिवाय पर्याय नसतो.सध्या तरी त्या अळ्यांमुळे काही त्रास नसला,तरी आपल्या शरीरात अळ्या वळवळताहेत ही जाणीव फारशी चांगली नसते.या अळ्या आपलं शरीर आतून पोखरून काढताहेत,अशी दृश्यं ज्युलियनला आपल्या डोळ्यांसमोर दिसू लागतात.

आता नदीचा प्रवाह आणखी मोठा झालेला असतो आणि तो वाहता असल्यामुळे त्यात पोहत पोहत पुढे जाता येऊ शकेल असा शोध ज्युलियनला लागतो. त्यामुळे तिच्या प्रवासाचा वेग वाढतो आणि शक्तीही कमी खर्च होते.नदीत मध्ये मध्ये मोठाले ओंडके पडलेले असतात.त्यांच्यावर न आदळता पुढे जाण्याची कसरत तिला करावी लागते एवढंच.या टप्प्यात तिला नदीकिनारी अनेक प्राणीही दिसतात,पण त्यांची भीती वाटावी असं त्यात कुणीही नसतं.एकदा मात्र ज्युलियन संकटात सापडता सापडता बचावते.थोडा काळ नदीच्या काठी विश्रांती घेत असताना तिला एक ओळखीचा आवाज ऐकू येतो. छोट्या मगरीच्या पिल्लांचा तो आवाज असतो.ती पिल्लं नदीतून बाहेर येत अगदी तिच्या जवळ येऊन ठेपलेली असतात.पाहते तर त्यांची आईही नदीतून बाहेर पडण्याच्या बेतात असते.पिलांच्या सुरक्षेपोटी ती आपल्यावर जीवघेणा हल्ला करू शकते हे ज्युलियनला माहिती असतं.पण इथेही जंगलाबद्दलचं तिचं ज्ञान आणि अनुभव उपयोगी पडतो.

काठावर येणारी मगर दिसली की कुणीही तिच्यापासून दूर जंगलात पळून जाण्याचा विचार करणार.पण जंगलात घुसलं तर इतर प्राण्यांची भीती तर आहेच,

शिवाय वाट चुकण्याचा धोकाही मोठा आहे,हे ज्युलियनला माहिती असतं. त्यापेक्षा ती स्वतःच्या अनुभवावर विसंबून थेट पाण्यात शिरते आणि मगरीशेजारून पोहत पुढे पुढे जाते. आपण आपल्या मार्गाने गेलं तर मगर आपल्या वाटेला जाणार नाही,हा तिचा होरा बरोबर ठरतो आणि एक धोका टळतो.

आता पोहणं आणि चालणं ज्युलियनसाठी आणखी अवघड होऊ लागलेलं असतं.नजर आणखी धूसर होऊ लागते.आता आणखी तग धरायचा असेल तर काही तरी खायला हवं हे तिला कळत असतं.पण काय खाणार? पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे सगळीकडे बेडूक ओरडत असतात.ते पकडून खावेत,असा विचार तिच्या मनात येतो.किळस बाजूला ठेवून ती बेडूक पकडण्याचा प्रयत्नही करते;पण काही केल्या तिला ते जमत नाही.शक्ती आणि चपळता दोन्ही कमी झालेली असल्यामुळे अगदी हातात येऊनही बेडूक तिच्या तावडीतून सुटतात.

दहावा दिवस उजाडतो.आता थोडा काळ विश्रांती घेतल्याशिवाय पुढचा प्रवास शक्य नाही,असं वाटून ती एका ठिकाणी किनाऱ्याशी थांबते.थोडं चालल्यावर तिला समोर एक बोट उभी दिसते.अगदी नवी कोरी करकरीत बोट. आपल्याला नक्कीच भास होतोय याची जणू ज्युलियनला खात्रीच असते;पण तरीही शंका नको म्हणून जवळ जाऊन हात लावून बघते,तर बोट खरीच असते.

किनाऱ्याकडे लक्ष जातं,तर तिथे एक छोटा तंबू उभारलेला तिला दिसतो.ती एका ओढीने त्या तंबूकडे जायला लागते;पण तिच्या अंगात त्राण इतके कमी असतात की शंभर फूट चालायला तिला काही तास लागतात.त्या तंबूत कुणी तरी माणूस असेल अशी तिला आशा असते;पण तिथे कुणीच नसतं.कुणी येऊन गेलंय अशी चिन्हंही नसतात.पण त्या तंबूमुळे ज्युलियनला किमान एक आसरा मिळतो.शिवाय तिथे तिला केरोसीनची बाटली मिळते.ती पाहिल्यावर तिला खांद्याजवळच्या जखमेत झालेल्या अळ्या आठवतात.

महत्प्रयासाने बाटलीचं बूच उघडून ती थोडं थोडं केरोसीन जखमेवर टाकते.प्रचंड वेदना होतात आणि पहिल्यांदा अळ्या आणखी आत जाण्याचा प्रयत्न करतात,पण नंतर मात्र त्या झपाट्याने बाहेर येऊ लागतात.ज्युलियन अशा ३० अळ्या मोजते.सगळ्या बाहेर आलेल्या नसल्या तरी तेवढ्या कामगिरीमुळेही ती स्वतःवर खूप होते.ज्युलियन इतकी थकलेली असते की तिथे मेल्यासारखी झोपून राहते.इतकी चांगली झोप फाइव्ह स्टार हॉटेलमध्येही लागणार नाही असं तिच्या मनात येतं.

आता पुढे चालत राहावं की थांबून या तंबूचा मालक येईल याची वाट पाहावी हे ज्युलियनला कळत नाही. नदीच्या काठाशी लागलेली बोट घेऊन पुढे जावं असा मोहही तिला एकदा होतो;पण स्वतःची सुटका करून घेण्यासाठी दुसऱ्या माणसाचा जीव धोक्यात घालणं तिला पटत नाही.शिवाय या अशक्त अवस्थेत ती बोट चालवू शकेल का याबाबतही शंका असतेच.त्यामुळे आणखी थोडी विश्रांती घेऊन चालणं पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेते.

बाहेर पाऊस पडत असतो आणि आत ज्युलियन अर्धवट जागी अर्धवट ग्लानीत पडून असते.डोक्यात नाना विचारांचा गोंधळ उडालेला असतो.तिच्या मनात येतं,अपघाताला दहा दिवस नक्कीच उलटून गेले आहेत.आतापर्यंत नक्कीच सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढलं गेलं असणार.

फक्त आपणच या जंगलात एकटे भरकटतोय.आपली सुटका होण्याआधीच आपण मरून गेलो तर आपला शेवट कुठे झाला हे जगात कुणालाही कळणार नाही.दहा दिवस आपण कोणत्या परिस्थितीतून गेलो,किती धीराने-किती कष्ट घेऊन चालत राहिलो हे जगात कधीच कुणाला कळणार नाही,ही भावना तिला व्यापून टाकते.कालपर्यंत आपल्या गोतावळ्यात असणारा माणूस असा अचानक कसा नाहीसा होऊ शकतो,या नियतीच्या खेळाचं तिला प्रचंड कोडं वाटत राहतं.या परिस्थितीचं नवल करत ती पडून राहते.... आणि तितक्यात बाहेरून माणसांचे आवाज ऐकू येतात.आधी ज्युलियनला हाही भासच वाटतो.पण हळूहळू ते आवाज जवळ येतात,तिच्या समोर येऊन उभे ठाकतात.त्यांच्या चेहऱ्यावर आश्चर्य, धक्का आणि भीतीचं मिश्रण असतं.त्यांनी काही विचारण्याआधीच ज्युलियन बोलू लागते,"मी लान्सा क्रॅशमधून वाचलेली मुलगी आहे.माझं नाव ज्युलियन, मी गेल्या दहा दिवसांपासून चालते आहे.आणि आता मरणाची दमले आहे."तिचं बोलणं ऐकल्यावर त्या माणसांचे चेहरे बदलतात.ते भराभर तिला हवं-नको ते बघायला लागतात.

आपल्याकडचं खाणं काढून तिला देतात.खरं तर त्या दिवशी या तंबूकडे येण्याचा त्यांचा अजिबात विचार नसतो;पण सहज म्हणून ते तिथे येतात आणि त्यांना ज्युलियन सापडते.

ज्युलियन सुखरूप हॉस्पिटलमध्ये जाऊन पोहोचते. वडिलांना भेटते.पण लिन्साच्या अपघातात वाचलेले आपण एकमेव प्रवासी आहोत आणि आपल्या आईसह इतर सर्व प्रवासी मृत्युमुखी पडल्याचं तिला कळतं.

आपण वाचल्याचा आनंद घ्यावा की आईच्या मृत्यूचं दुःख करावं अशा नव्या पेचात ती सापडते.हीच द्विधा अवस्था तिचे वडीलही अनुभवत असतात.मुलगी सापडली याचा आनंद तर असतोच;पण त्यांचं आपल्या पत्नीवर इतकं प्रेम असतं की त्या धक्क्यातून ते कधीच सावरू शकत नाहीत.त्यामुळे जंगलातल्या संकटातून वाचली असली तरी नव्या परिस्थितीत नव्या समीकरणांसह आयुष्याची घडी बसवण्याच्या नव्या आव्हानाला तिला सामोरं जावं लागतं.

ज्युलियन सुखरूप बचावल्याची बातमी जगभर पोहोचल्यावर आणि नंतरही ती किती धाडसी आणि असामान्य आहे असा कौतुकवर्षाव तिच्यावर झाला-अजूनही होत असतो.पण ज्युलियन म्हणते,'मी असामान्य अजिबातच नव्हते.आजही नाही.आई-वडिलांनी मला जंगलाच्या सान्निध्यात वाढवलं म्हणून मी तिथे तरू शकले;पण माझ्या जागी आणखी कोणी असतं तरी त्यांनीही तेवढंच धाडस दाखवलं असतं.असामान्य परिस्थिती आपल्याला त्या त्या वेळी असामान्य बनवते,हे त्यामागचं खरं कारण असलं पाहिजे.

माझ्या लाडक्या सर्व वाचकांचे आभार व धन्यवाद.मृत्यू पाहिलेली माणसं,मृत्यूच्या दारातून परतलेल्या व्यक्तींच्या थरारक कहाण्या,संकटांच्या वावटळीत तग धरून राहणाऱ्या सामान्यांमधल्या असामान्यांना,गौरी कानेटकर,समकालीन प्रकाशन,आतापर्यंत आपण नऊ कहाण्या वाचल्या.ह्या कहाण्या व या पुस्तकाचा प्रवास या ठिकाणी संपलेला आहे.पण आपल्या सोबतचा हा वाचण प्रवास निरंतर सुरुच राहील.

… समाप्त



5/7/26

तरुण मुलीची सत्यकथा / True story of a young girl

त्या रात्री ज्युलियनला गाढ झोप लागते. रात्रीतून किती किडे अंगावर वळवळले असतील, कोणते प्राणी आसपास फिरून गेले असतील याचा विचार करण्याचंही ती टाळते. बहुतेक अजूनही तिच्यावरच्या धक्क्याचा परिणाम पुरता ओसरलेला नसतो. सकाळी उठून ती पुन्हा चालू लागते. चालताना अनेकदा तिला धोकादायक किडे दिसत असतात. एके ठिकाणी पक्ष्याला गिळंकृत करू शकणारा एक मोठा विषारी कोळी तिला दिसतो. धोका वाटला तर माणसावरही हल्ला करणारा तो कोळी असतो. पण नशिबाने तो झऱ्याच्या दुसऱ्या बाजूला असतो. ज्युलियन आणि तो दोघंही एकमेकांकडे बघतात आणि आपापल्या दिशेने चालू लागतात.खूपदा ज्युलियनला आकाशातून विमानांचे आवाजही ऐकू येत असतात.

बचावकार्यासाठी घिरट्या घालणारं विमान असावं असं ती ताडते; पण झाडांच्या दाटीतून तिला विमान दिसणं शक्य नसतं, मग विमानातून ती दिसणं तर लांबच राहिलं. पण तरीही विमानाचा आवाज ऐकू आल्यावर ती खच्चून ओरडून घेते.

आपला आवाज या झाडांच्या टोकांपर्यंत पोहोचणंही शक्य नाही हे माहिती असूनही. कदाचित जसजसा हा झरा मोठा होत जाईल आणि त्याचं रूपांतर नदीत होईल तिथे कदाचित जंगलही कमी झालेलं असेल आणि विमानातून खालचा भाग दिसू शकेल. तोपर्यंत आपल्याला चालत राहण्याशिवाय पर्याय नाही, अशी खूणगाठ बांधून ज्युलियन चालत राहते.

पायपिटीचे पहिले दोन-तीन दिवस ज्युलियन जास्त विचार न करता यांत्रिकपणे चालत असते. अजूनही तिची बधिरावस्था पूर्ण संपलेली नसते. अधूनमधून तिच्या मनात आईचा विचार डोकावत असतो; पण आतापर्यंत नक्कीच आईची सुटका झाली असेल असं मानून ती सारे विचार मनातून बाजूला काढून टाकते. झऱ्याकाठाने चालत राहणं एवढंच आपलं सध्याचं काम आहे असं जणू या परिस्थितीने तिला सांगितलेलं असतं.

चौथा दिवस थोडा वेगळा उजाडतो. दुपारच्या वेळेस तिला एक कर्कश आवाज ऐकू येतो. तो ऐकून पहिल्यांदाच ज्युलियन भीतीने गोठून जाते. आवाजावरूनच ती ओळखते की हा भल्या मोठ्या गिधाडांचा आवाज आहे. एवढ्या जवळ गिधाडं आहेत याचा अर्थ कुठे तरी मोठ्या प्रमाणावर मांस आहे हे उघड असतं. तिच्या मनात येतं, या गिधाडांचं इथे येण्याचं कारण माझी आईच असेल तर ? थोड्याच वेळात तिला गिधाडांचं अन्न दिसू लागतं. विमानातल्या तीन आसनी खुर्चीवर तीन मृतदेह वेड्यावाकड्या अवस्थेत पडलेले असतात. जमिनीत घुसलेली तोंडं आणि आकाशाच्या दिशेने उंचावलेले पाय. त्या तिघांमधली एक बाई असते. ती आपली

आई तर नसेल ना, या विचाराने ज्युलियन सुन्न होऊन जाते. त्या ठिकाणाहून पळून जावं अशी इच्छा तिचा ताबा घेते, पण शहानिशा करण्याशिवाय पर्याय नसतो. जवळ जाऊन बघते तर तिला त्या बाईच्या पायाची रंगवलेली नखं दिसतात. ती सुटकेचा निःश्वास टाकते. आई कधीच नखं रंगवत नाही, हे तिला माहीत असतं. पण त्या दृश्यामुळे तिची बधिरावस्था थोडीशी कमी होते. आपल्या आईचं काय झालं असेल, हा विचार तिच्या मनाचा ताबा घेतो. आई सुखरूप असणार, असं स्वतःला बजावत ती चालत राहते.आता ज्युलियनकडच्या कँडीही संपलेल्या असतात. पावसाळा असल्यामुळे कुठल्याच झाडाला फळं नसतात.पामचा गर वगैरे खावा म्हटलं तर तो काढण्यासाठी तिच्याकडे सुरी नसते. जंगलातल्या बहुतेक गोष्टी विषारी असल्यामुळे कुठलाही धोका पत्करायला ती तयार नसते. त्यामुळे झऱ्यातलं माती मिसळलेलं गढूळ पाणी पिऊन पोट भरण्याशिवाय आता दुसरा पर्याय नसतो,पण जिथे मानवी वस्ती नाही तिथलं पाणी पिण्यात फारसा धोका नाही एवढं ज्युलियनला माहिती असते. बहुधा ते पाणी प्यायल्यामुळेच तिला भुकेचीही फारशी जाणीव होत नाही ही त्यातल्या त्यात चांगली गोष्ट.पण तिच्या शरीरातली ताकद मात्र झपाट्याने कमी व्हायला लागलेली असते.

पाचव्या किंवा सहाव्या दिवशी तिला एका ओळखीच्या पक्ष्याचा आवाज येतो.पाण्याच्या मोठ्या साठ्याजवळ आढळणाऱ्या या पक्ष्याचा तिच्या आईने सखोल अभ्यास केलेला असतो.

पाण्याजवळ आढळत असल्याने त्याच्या आसपास मानवी वस्तीही असू शकते,असं वाटून आपला एरवीचा बेफिकीर मूड बाजूला ठेवून ज्युलियन काहीशी आनंदित होते. अतिशय अवघड वाट चालत चालत अखेर ती अशा ठिकाणी येऊन पोहोचते की तिच्या झऱ्याने आता छोट्या नदीचं रूप घेतलेलं असतं.साधारण तीसेक फूट रुंद पात्र तिच्या समोर असतं.वर पाहते तर जंगलही काहीसं विरळ झालेलं असतं आणि आकाशाचा एक तुकडा तिला स्वच्छ दिसू लागतो.आता इथून वस्ती फार दूर नसणार असं तिला वाटून जातं.थोड्याच वेळाने तिला विमानांची घरघरही ऐकू येऊ लागते.

ती पुन्हा एकदा जोरजोरात ओरडून विमानांचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करते.आता आपण विमानातून नक्की दिसू असं तिला वाटत असतं.विमानांचे आवाज कमी कमी होत लांब निघून जातात तेव्हाही ती स्वतःची समजूत काढते, की आता थोड्याच वेळात विमान पुन्हा परतेल आणि आपली सुटका होईल.पण बराच काळ जाऊनही काहीच घडत नाही.अंधार पडू लागतो तसं तिचं मन निराशेने भरून येतं.आपण सोडून विमानातल्या इतर सगळ्या प्रवाशांची सुटका झाली असणार आणि आपण सापडत नसल्यामुळे आता शोधमोहीम थांबवण्यात आली असणार असं वाटून तिचा संताप संताप होतो.रागाचा भर ओसरल्यावर ज्युलियन थोडी शांत होते.

आपल्याकडे एवढ्या भावनिक आंदोलनांसाठी अजूनही इतकी शक्ती शिल्लक आहे याचं तिला आश्चर्य वाटत राहतं.याचा अर्थ अजूनही आपण आशा सोडता कामा नये. चालत राहिलो तर लवकरच एखाद्या वस्तीपाशी पोहोचू, हा विचार पुन्हा एकदा तिचा ताबा घेतो आणि पुन्हा एकदा पुढे मार्गक्रमण कसं करायचं याचा विचार करण्यात ती स्वतःचं मन गुंतवते.एकच सँडल घातलेल्या पायांनी काठावरून चालवणं अवघड जात असल्यामुळे ती नदीच्या पात्रातूनच चालायचं ठरवते.शिवाय जंगलामध्ये नदीच्या काठावर स्टिंग रे विश्रांती घेत बसलेले असतात याचीही तिला माहिती असते.अशा एखाद्या स्टिंग रेवर चुकून जरी पाय पडला तरी मृत्यू ओढवणार हे नक्की.त्यापेक्षा नदीतून चाललेलं बरं, असा विचार ती करते.अर्थात नदीच्या पाण्यातही धोके कमी नसतात.मगरींची भीती असते.शिवाय पिरान्हा नावाचे शिकारी मासेही या पाण्यात आढळण्याची शक्यता असतेच.पण हे प्राणी कारणाशिवाय माणसावर हल्ला करणार नाहीत हे ज्युलियनला माहिती असतं. शिवाय,

काहीही असलं तरी हे धोके पत्करून चालत राहण्याशिवाय तिच्यापुढे पर्याय काय असतो?एखादी चांगली जागा सापडली तर तिथेच थांबून राहावं आणि सुटकेसाठी कोणी येईल याची वाट पाहावी का,असंही तिच्या मनात एक-दोनदा येऊन जातं.पण आता थांबलो आणि आणखी चार दिवसांनी पुन्हा चालण्याची वेळ आली तर तेवढी शक्ती आपल्याकडे उरणार नाही आणि आपण या जंगलातच संपून जाऊ याची जाणीव तिला पुढे रेटत असते.चालत राहिलो तर आपण एक ना एक दिवस मानवी वस्तीपर्यंत किंवा सुटकेसाठी शोधमोहीम राबवणाऱ्यांपर्यंत पोहोचू,असा विश्वास तिला मनातून वाटत असतो.एक चांगलं असतं,की मनातून तशी शंका असली तरी आता लवकरच शोधमोहीम थांबवली जाणार असल्याचं ज्युलियनला कळण्याची काही शक्यता नसते.तिला हेदेखील कळण्याची शक्यता नसते की विमानातील एकाही व्यक्तीची सुटका झालेली नसते.किंवा,तेव्हा तिला याचीही कल्पना आलेली नसते की विमान पडल्यानंतर सर्वच प्रवाशांना लगेच मृत्यू आलेला नसतो.काही प्रवासी काही काळ जिवंत असतात;पण तिथून बाहेर पडून स्वतःची सुटका करून घेण्याचं ज्युलियनसारखं भाग्य त्यांना लाभत नाही.त्या प्रवाशांमध्ये तिच्या आईचाही समावेश असतो.पुढे तिला जेव्हा हे समजतं तेव्हा आईचं त्या काळात काय झालं

असेल या विचाराने ती किती तरी रात्री तळमळत काढते.जंगलात असताना झाला नसेल एवढा त्रास तिला पुन्हा बाहेरच्या जगात येऊन या सत्याशी सामना करताना होतो.एका अर्थाने तिचा जगण्याचा झगडा सुरू होतो तो तिथून बाहेर पडल्यावरच.

पण सध्या आत जंगलात मात्र सर्व बातम्यांपासून दूर ती स्वतःच्या विचारांमध्ये चालत असते;पण पहिल्या तीन-चार दिवसांनंतर मात्र चालणं आणि रात्रीची झोप या दोन्ही गोष्टी अधिकाधिक त्रासदायक बनत जातात. रात्र तर अतिशय वेदनादायी असते.डास किंवा कोणते ना कोणते किडे रात्री तिच्या जवळपास उघड्या अंगावर चाल करून येत असतात.थोडी डुलकी लागते ना लागते तोच नवा दंश तिला जागं करत असतो.

चिलटं,माश्या, पिसवा आणि अशा हजारो प्रकारच्या किड्यांची संख्या इतकी असते की बास.ते किडे तिच्या तोंडात,नाकात, डोळ्यांत,कानांत सगळीकडे शिरून चावे घेत असतात. हे कमी की काय,म्हणून कधी तरी रात्रीतूनच पाऊस सुरू होतो.दिवसाच्या वेळी जंगलातली हवा दमट आणि उष्ण असली तरी रात्री पाऊस सुरू झाल्यावर मात्र कडाक्याची थंडी वाजते.पावसाचे थेंब सुया टोचल्यासारखे ज्युलियनच्या अंगात घुसत असतात. छोट्याशा ड्रेसमध्ये चिंब भिजून आता आणखी थंडी सहन होणं शक्य नाही अशा परिस्थितीत ज्युलियन रात्रच्या रात्र कुडकुडत काढते.

अशा वेळी बहुतेकदा ज्युलियन आपल्या आईचा विचार करत प्रार्थना करत राहते.हा अपघात कसा काय झाला, आपण उठलो तेव्हा एकट्याच कशा काय होतो,बाकीचे प्रवासी कुठे गेले,आई कुठे असेल,विमानाचे अवशेष कुठे पडले असतील,असे कोड्यात टाकणारे प्रश्न तिच्या मनाला व्यापून असतात.एवढ्या उंचीवरून पडल्यावरही आपण कसे काय वाचलो,हा प्रश्न तर अनेकदा तिच्या मनात उचंबळून येत असतो.

ज्याअर्थी आपण १० हजार फुटांवरून कोसळूनही वाचलो त्याअर्थी आता आपण या जंगलात मरून जाणं शक्य नाही. आपण जिवंत राहिलो त्यामागे काही तरी कारण असणार,

असं तिला सतत वाटू लागतं.चालता चालता,रात्र मुक्कामाच्या ठिकाणी थांबल्यावर ती खूप वेळ हा विचार करत राहते.आपण का जिवंत राहिलो?आपल्या आयुष्याचा हेतू काय? त्यातून आजवर कधीच न पडलेले प्रश्न तिला पडू लागतात.आपल्या आई-वडिलांप्रमाणे आपणही जीवशास्त्राचा अभ्यास करायचा हे आधीपासूनच ठरलेलं असतं,पण त्यामागच्या कारणांचा फारसा विचार मात्र तिने केलेला नसतो.पण आता स्वतःचा संवाद करायला वेळच वेळ असण्याच्या काळात हा विचार तिचं मन व्यापून टाकतो.ज्या जंगलातून ती बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असते त्याच जंगलाच्या अभ्यासासाठी,तिथल्या पक्ष्या-प्राण्यांच्या अभ्यासासाठी आपण आयुष्यभर काम करायला हवं…!

अपूर्ण शेवटचा तिसरा भाग पुढील लेखामध्ये…!!



5/5/26

तरुण मुलीची सत्यकथा / True story of a young girl

जिवावरच्या संकटातून स्वतःच्या हिमतीवर बाहेर पडण्याचा अनुभव माणसांना कायमचा बदलवून टाकतो.विमान कोसळल्यानंतर अ‍ॅमेझॉनच्या जंगलात दहा दिवस एकटीने पायपीट करणाऱ्या ज्युलियन कोपेक या तरुण मुलीची सत्यकथा अशा प्रसंगी मनात घडणाऱ्या उलथापालथर्थीची कहाणी सांगते.

२४ डिसेंबर १९७१.पेरूची राजधानी लिमाचा विमानतळ भरून वाहतो आहे.ख्रिसमसच्या आधीचा दिवस असल्यामुळे प्रत्येकालाच आपापल्या कुटुंबीयांजवळ पोहोचण्याची घाई आहे.सतरा वर्षांची ज्युलियन कोपेक आणि तिची आई मारिया या दोघी त्यात आहेत.ज्युलियनच्या आई-वडिलांचं पेरूच्या अमेझॉन जंगलात पुकाल्पा गावाजवळ संशोधन केंद्र आहे.तिचे वडील सध्या तिथेच आहेत.आदल्या दिवशी ज्युलियनच्या कॉलेजमध्ये कार्यक्रम असल्यामुळे त्यांना अगदी ऐन वेळचं फ्लाइट पकडायला लागतं आणि

 तेही अपघातांसाठी कुप्रसिद्ध असलेल्या लान्सा एअरलाइन्सचं.'दरवेळी अशा दुर्घटना घडत नसतात आणि आपल्यासारख्या सामान्य माणसांच्या आयुष्यात तर कधीच असं घडत नसतं', असं म्हणत या दोधी विमानात बसतात, लिमा ते पुकाल्पा हा अवध्या तासाभराचा प्रवास.हवा अगदी उत्तम असते,प्रवास सुरळीत सुरू असतो;पण दुपारी साडेबाराच्या सुमारास कोणतीही पूर्वकल्पना न देता एक वादळ अचानक विमानावर थडकतं.मोठा हादरा बसतो आणि काही कळायच्या आत ज्युलियनच्या लक्षात येतं की आपण विमानातून खाली कोसळतो आहोत..

… जाग येते तेव्हा ज्युलियन अ‍ॅमेझॉनच्या जंगलात चिखलमाती आणि पालापाचोळ्याने आच्छादलेल्या जमिनीवर पडलेली असते.एका क्षणात तिच्या लक्षात येतं की आपलं विमान क्रैश झालं आहे आणि आपण जंगलात कोसळलो आहोत आणि आपली आई आपल्याजवळ दिसत नाही.पण आई-वडिलांचं संशोधन केंद्र अ‍ॅमेझॉनमध्येच असल्याने या जंगलाचा स्वभाव तिच्या ओळखीचं असतो,हाच काय तो दिलासा.ती उठून उभी राहण्याचा प्रयत्न करते;पण त्यासरशी तिच्या डोळ्यांसमोर अंधारी येते. थोडा वेळ तशीच पडून राहिल्यावर ती हातावरचं घड्याळ चाचपून पाहते,तर बरेच तडे गेले असले तरी घड्याळ अजून सुरू असतं.नऊ वाजलेले असतात. प्रकाशावरून ज्युलियन ताडते की सकाळची वेळ असावी.म्हणजे आदल्या दिवशी दुपारी विमान कोसळल्यापासून सकाळपर्यंत ती बेशुद्धावस्थेत जंगलामध्ये पडून असते.बऱ्याच प्रयत्नांनंतर तिला उठून उभं राहायला जमतं. आपल्याला नेमकं कुठे आणि किती लागलंय हे ती चाचपून बघते.मानेजवळचं एक हाड वेडवाकडं लागत असल्याचं आणि पिंढरीला एक खोल जखम झाल्याचं तिला तपासणी केल्यावर जाणवतं;पण आश्चर्य म्हणजे दोन्ही ठिकाणी तिला दुखत नसतं.किमान १० हजार फुटांवरून कोसळूनही एवढ्या मामुली जखमांवर आपलं कसं काय निभावलं हे तिला कळत नाही.

ज्युलियन कोपेक,जंगलात येऊन पडलेल्या मुलीची गोष्ट,मृत्यू पाहिलेली माणसं,गौरी कानेटकर,समकालीन प्रकाशन,

आपण खरंच विमानातून खाली कोसळलो की हे केवळ स्वप्न आहे,असा प्रश्न तिला पडतो.या जखमांपेक्षा दोन-तीन गंभीर समस्या असतात.एक तर तिचा चष्मा हरवलेला असतो,एक सँडल गायब असते आणि तिचा उन्हाळ्यासाठी घातलेला आखूड ड्रेस जंगलातल्या मुक्कामासाठी अगदीच चुकीचा असतो.चांगले बूट आणि योग्य कपडे नसताना अमेझॉनच्या जंगलात राहणं म्हणजे खरं तर मृत्यूला आमंत्रण.कारण साप आणि नाना प्रकारच्या विषारी कीटकांचं ते साम्राज्यच. त्यामुळे कटकट वाटत असूनही ज्युलियन एक सँडल घालूनच चालत असते.किमान एका पायाचं तरी थोडं संरक्षण !

उठून चालता येऊ लागल्यावर ज्युलियनची पहिली प्रतिक्रिया असते ती आजूबाजूला विमानातलं अन्य कोणी दिसतं का ते पाहण्याची.अ‍ॅमेझॉनचं रेन फॉरेस्ट म्हणजे प्रचंड आकारांच्या झाडांची गर्दी असलेलं जंगल.दहा पावलंही सरळ चालता येऊ शकणार नाही इतकं दाट.त्यातून वाट काढत काढत ज्युलियन आसपासचा परिसर हिंडते,पण तिथे विमान कोसळल्याची कुठलीच चिन्हं नसतात.ना विमानाचे अवशेष,ना जखमी माणसं,ना विमानात तिच्या शेजारी बसलेली तिची आई.विमानातून फक्त आपणच खाली कोसळलो की काय असं ज्युलियनला वाटतं.अर्थात ही शोधाशोध करताना एखादी खूण लक्षात ठेवणं गरजेचं आहे याचं भानही तिला असतं.कारण अमेझॉनमध्ये व्यवस्थित आखलेल्या खुणा नसतील तर माणसाला चकवा लागायला वेळ लागत नाही हे ज्युलियनला चांगलं ठाऊक असतं थोड्याच वेळात तिला कळून चुकतं की आपल्या आसपास मदतीला इतर कोणीही नाही. 

विमान नेमकं कुठे पडलंय ते आपल्याला माहिती नाही. थोडक्यात,या किर्र जंगलात आपण आता एकटेच असून कोणीही तातडीने आपल्या मदतीला येण्याची शक्यता नाही.पण तरीही ज्युलियन घाबरून जात नाही की आपण कुठे जंगलात येऊन पडलो अशी भावना तिच्या मनात तयार होत नाही.याचं एक कारण बहुधा विमानातून खाली कोसळल्याच्या धक्क्यामुळे ती काहीशी बधिर झालेली असते.कोणतीच भावना पटकन तिचा ताबा घेत नाही.ना तिला भीती वाटत असते,ना जखमांमुळे वेदना होत असतात ना आता आपलं कसं होणार याची चिंता वाटत असते.

दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे अमेझॉनचं हे जंगल तिच्या ओळखीचं असतं.लहानपणापासून ती आई-वडिलांच्या संशोधन केंद्रात येत-जात असते आणि दोन-तीन वर्षं तर ती या जंगलात राहिलेली असते,आई-वडिलांबरोबर जंगलात भरपूर भटकलेली असते.जंगलाचे कायदेकानून तिला माहिती असतात. झाडा-वनस्पतींशी,प्राण्यांशी,असंख्य विषारी किड्यांशी,सापांशी आणि एकूणच प्रत्येक वेळेला रूप बदलणाऱ्या जंगलाशी तिची ओळखच नव्हे तर मैत्री असते.

आता आपल्यालाच जंगलातून बाहेर पडण्याचा रस्ता शोधावा लागणार हे लक्षात आल्यावर तिला वडिलांनी सांगितलेला जंगलातला पहिला नियम आठवतो कधीही जंगलात हरवलीस तर वाहतं पाणी शोधून काढ.पाणी ज्या दिशेला वाहतंय त्या दिशेने पाण्यासोबत चालत राहिलीस तर माणसांच्या वस्तीपर्यंत पोहोचशील.त्यामुळे तिच्याही नकळत ती पाण्याचा शोध घेऊ लागते.थोडा वेळ आसपास फिरल्यावर ज्यूलियनला एक ओळखीचा आवाज ऐकू येऊ लागतो.अगदी छोटा ओहोळ वाहत असल्याचा आवाज.त्या दिशेने गेल्यावर थोड्याच वेळात ती पाण्यापाशी जाऊन पोहोचते.वाटेत तिला कँडीचं एक पाकीट सापडत,पण ते सोडता इतर प्रवाशांच्या काहीच खाणाखुणा तिला दिसत नाहीत.तिच्या स्वतःच्या तुलनेने छोट्या जखमा पाहता विमानातले प्रवासी बचावले नसतील अशी शंकाही तिला येत नाही.आपल्यापासून लांब कुठे तरी तेही जिवंत असतील आणि त्यात आपली आईही असेल असंच तिला वाटत असतं. त्यामुळे त्यांची वाट पाहत थांबून न राहता या छोट्या ओहोळाचा माग पकडून चालत राहायचं असं ती ठरवते.पण या ओहोळाच्या सोबतीने चालणं सोपं नसतं.झाडांच्या गर्दीमध्ये पाय ठेवायलाही जागा नसते. शिवाय सगळा परिसर चढ-उताराचा असतो.कधी कधी ज्युलियनला झाडांमधून वाट काढत बरंच चढून जावं लागतं;पण हे चढ टाळण्यासाठी शॉर्टकट घेऊन जंगलाच्या आत शिरणं किती जोखमीचं आहे याची तिला कल्पना असते.

त्यामुळे कितीही दमणूक होत असली तरी ती पाण्याच्या काठाने चालत राहते.थोड्या वेळाने हा ओहोळ मोठा होत जातो आणि त्याचं छोट्या झऱ्यात रूपांतर होतं.आता त्याच्या कडेने चालणंही थोडं कमी त्रासदायक बनतं.अपघातानंतरच्या दुसऱ्या दिवशी संध्याकाळी पाचच्या सुमारास अंधार पडायला लागतो आणि ज्युलियन रात्री मुक्कामासाठी थोडी बरी जागा शोधून झोपण्याची तयारी करते.

फुट कँडीचं एक पाकीट वगळता ज्युलियनकडे खायला काहीच नसतं.मासे पकडून भाजून खावेत,असा विचार केलाच तरी आग पेटवायलाही तिच्याकडे काही साधनं नसतात.अगदी दोन वाळक्या काटक्यांनी किंवा दगडांनी ठिणगी कशी पेटवायची हेही तिला माहिती असतं;पण या पावसाळ्यात सगळं जंगल भिजलेलं असताना तेही शक्य नसतं.एक कँडी खाऊन झऱ्यातलं पाणी भरपूर पिणं एवढंच तिच्या हातात असतं.

★★★ अपुर्ण उर्वरित भाग पुढील लेखामध्ये…