पूर्वेकडे आपण जरा फिरून आलो.चला पुन्हा रोम शहरी.सीझर मेल्यावर त्याचा एक चुलत नातू गादीवर बसला.त्याचे नाव ऑक्टोव्हियस.त्याने दुसरे त्रिकूट बनविले.अॅन्टोनी,लॅपिडस व ऑक्टोव्हियस.या त्रिकुटाने सीझर,पॉपे व क्रॅशस यांच्याप्रमाणेच सारी पृथ्वी आपसांत वाटून घेतली.तिघांनाही लूट करण्यास नीट वाव मिळावा म्हणून ही विभागणी करण्यात आली. आपले काम नीट,निर्वेध व सुरळीतपणे चालावे यासाठी काही लोकांना आपल्या मार्गांतून दूर करणे त्यांना भाग होते! त्यांच्या अवकृपेला बळी पडलेल्यांत सुप्रसिद्ध वक्ता सिसरोही होता.सिसरो मारला जावा असे अॅन्टोनी व लॅपिडस यांना वाटत होते.प्रथमप्रथम त्याला वाचवू इच्छित होता.पण थोड्याशा विचार विनिमयानंतर सिसरोला ठार मारण्याच्या बाबतीत तिघांचेही एकमत झाले.
प्ल्युटार्क लिहितो; "त्या तिघांत झालेल्या कराराच्या अटी पुढीलप्रमाणे होत्या; "सीझर (ऑक्टोव्हियस) याने सिसरोची बाजू सोडावी,लॅपिडसने आपला भाऊ पॉलस याचा त्याग करावा व अॅन्टोनीने आपला मामा ल्यूसियस सीझर याला सोडावे." अशा रीतीने त्यांच्या मनातल्या क्रोध-द्वेषांनी त्यांची माणुसकी नष्ट केली.कोणताही हिंस्र वन्य पशूसुद्धा माणसाहून अधिक क्रूर व रानटी नसतो, हे त्यांनी जगाच्या निदर्शनास आणून दिले. क्रोधांध माणसाच्या हाती सत्ता आल्यास तो पशूहूनही पशू होतो.
त्या तिघांनी आपापले काटे काढून टाकून शिवाय आणखी शेकडो जणांची कत्तल केली,पण नंतर ते तिघे पुन्हा नेहमीप्रमाणे आपसांत भांडू लागले.त्या तिघांच्या तंट्यांत लॅपिडस केव्हाच मागे पडला व शेवटी मुख्य प्रतिस्पर्धी दोनव उरले.अॅन्टोनी इजिप्तमध्ये गेला व सीझरप्रमाणे क्लिओपात्रा हिच्या प्रेमपाशात सापडला.
ऑक्टेव्हियसला जिंकण्याचा एक दुबळा प्रयत्न त्याने केला;पण खि.पू. ३१ या वर्षी अॅक्टियमच्या आरमारी लढाईत त्याचा मोड झाला व ऑक्टोव्हियस रोमचा प्रतिस्पर्धीहीन स्वामी झाला.त्याने "ऑगस्टस" म्हणजे 'मोठा' ही अहंकारी पदवी धारण केली व रिपब्लिकची परंपरा राखण्याच्या ढोंगाआड सर्व सत्ता हळूहळू आपल्या हाती घेतली.तो पहिला रोमन सम्राट झाला.त्याने एक्केचाळीस वर्षे राज्य केले. (ख्रि. पू. २७ ते इ.स. १४). आपण रोमनांचा सम्राट नेता व देव आहोत,अशी घोषणा त्याने केली.त्याचे शरीर म्हणजे जणू देवाचे,त्याचा राहता राजवाडा म्हणजे जणू पवित्र देव मंदिर,अशी त्याची समजूत होती.त्याच्या ठायी उतावीळपणा नव्हता.तो धाडसी व कारस्थानी होता. कोणतेही कपट करायला तो मागेपुढे पाहत नसे.
थॉमस डी क्विन्सी आपल्या 'सीझर्स' नामक पुस्तकात लिहितो, "इतिहासात नमूद असलेल्या कोणत्याही कमालीच्या दुष्टपणाच्या कृत्यांशी तुलनेत कमी पडणार नाहीत,अशी ऑगस्टसची दुष्कृत्ये होती. देवांना खुश करण्यासाठी त्याने एकदा स्वतःच्या हातांनी यज्ञवेदीवर अनेक कैद्यांचा बळी दिला.एकदा एका युद्धानंतर आपल्या सैन्यास पुरेसा पगार देता येत नाही असे पाहून त्याने काही श्रीमंतांस ठार केले व त्यांच्या इस्टेटी सरकारजमा करून सैन्याचा पगार भागविला! मृत्यूशय्येवर असताना आपण आता जगातून जाणार,म्हणून आपली शेवटची स्तुति-स्तोत्रे गावयास त्याने नोकरांना सांगितले.आपण फारच दिव्य व भव्य जीवन जगलो,असे त्याला वाटे.इतकी उदात्त भूमिका केल्यावर पडद्याआड जाण्यास तो तयार होता; पण जाता जाता स्वतःचे पोवाडे ऐकू इच्छित होता.'
ऑगस्टसनंतर टायबेरियस गादीवर आला.त्याने इ.स. १४ ते ३७ पर्यंत राज्य केले.रोमनांच्या मानाने तो काही फार वाईट नव्हता.त्याला 'दारुडा टायबेरियस' म्हणत. जरा अधिक कठोरपणे लिहिणारे इतिहासकार त्याच्या बाबतीत म्हणतात,'तो दारू व रक्त पिऊन मस्त असे.' त्याने काही रक्त सांडले हे खरे.'पण त्या काळाच्या मानाने त्याने सांडलेले रक्त फार होते असे मात्र म्हणता येणार नाही.'इतर सम्राटांप्रमाणेच त्यानेही अनेकांना फाशी दिले.दुसऱ्यांना मारण्यात त्याला आनंद वाटे.पण तुलना केली असता त्याने कमी बळी घेतले,असेच म्हणावे लागेल.आयुष्याचा बराचसा भाग त्याने कॅप्री बेटावर घालविला.हे बेट समुद्रसपाटीपासून एक हजार फूट उंच होते.ज्यांच्यावर त्याची खप्पा मर्जी होई,त्यांना तो तेथील टेकड्यांवरून समुद्रात लोटी व ते दृश्य मजेने पाही.आपला मुख्य प्रधान सेजानस याच्या लहान मुलीला त्याने ठार केले.हीच त्याने केलेल्यांपैकी सर्वांत जास्त दुष्टपणाची व नीचपणाची गोष्ट होय. तो प्रधानही त्या वेळी मारला गेला.त्या लहान मुलीने विचारले, 'एवढ्याशा लहान वयात मी असे काय पाप केले आहे की,त्यासाठी तुम्ही मला ठार मारावे ? पण सम्राटाचा शब्द म्हणजे कायदा होता. अर्थातच तिला उत्तर कोण देणार? तिला तुरुंगात नेऊन गळा दाबून ठार मारण्यात आले!
तरीही टायबेरियस हा प्राचीन सम्राटांतला कमीतकमी दुष्ट सम्राट होता.तो मेल्यावर कॅलिगुला सम्राट झाला. त्याने इ.स. ३७ ते इ.स. ४१पर्यंत, म्हणजे फक्त चार वर्षे राज्य केले; पण या चारच वर्षांत त्याने अनंत क्रूरकर्मे केली. त्याने स्वतःच्या तीन बहिणींवर बलात्कार केला!करमणूक म्हणून तो माणसे ठार करी ! एकदा सर्कशीच्या रिंगणांतील हिंस्र पशूना पुरेसे अन्न नव्हते म्हणून त्याने त्यांच्यासमोर कैद्यांची रांगच्या रांग उभी करून त्यांना पोटभर जेवण दिले!कधीकधी मेजवानीच्या वेळी मेजवानीचाच एक गंमतीचा भाग म्हणून तो आपल्यासमोर लोकांना फाशी देववी ! तलवारीच्या एकाच घावासरशी डोके उडविलेले पाहण्यात त्याला विशेष आनंद होत असे.त्याने एकदा दोघा कॉन्सल्सना घरी जेवणास बोलावले होते.तो एकदम खो खो करून हसू लागला,तेव्हा त्या कॉन्सल्सनी नम्रतेने विचारले,'हसण्याचे कारण काय?' त्यावर त्याने उत्तर दिले, 'डोक्याशिवाय तुम्हा दोघांची धडे कशी दिसतील असा विचार मनात आल्यामुळे मला एकदम हसू आले.'
त्याने खुनाच्या कलेत पारंगत व्हायचे ठरविले व ते शिक्षण पुरे घेतले.लॅटिन इतिहासकार सुएटोनियस लिहितो,"बलिदानार्थ काढलेल्यांच्या वेदना कशा वाढतील,त्या बराच वेळ कशा टिकतील,हे तो नेहमी पाहत असे.तो सांगत असे,असे घाव घाला की,आपण मरत असल्याची जाणीव त्या मरणाच्या मुखी पडणाऱ्यास नीट व्हावी;एक घाव नि दोन तुकडे असे करू नका."
ज्युपीटर देव आपणाशी नेहमी बोलत असतो असे तो म्हणे.रस्त्यातून तो आपला एक कान जरा उंच करून चाले व पुटपुटत चाले.जणू काय देवाशीच आपले संभाषण चालले आहे असे तो भासवी.चंद्राला तो आपली बायको म्हणे.त्याने आपल्या एका घोड्याला चंद्राचा उपाध्याय म्हणून नेमले होते.
थोडक्यात सांगायचे तर तो वेडा होता.त्याच्यात राम नव्हता.त्याच्या या दुष्ट लहरी नष्ट होतील अशी आशा नव्हती.ज्यूलियसपासून नीरोपर्यंत सारेच सीझर वेडे होते,त्यांची वेडेपणाची लहर जणू आनुवंशिक होती! रोमनांनी कॅलिगुलाचे हे वेडेचार चार वर्षे सहन केले.
नंतर मात्र त्यांनी त्याला ठार केले! पुढचा सम्राट कॅलिगुलाचा चुलता क्लॉडियस याने इ.स. ४१ ते इ.स. ५४ पर्यंत राज्य केले.तो रोगट,नेभळट,असंस्कृत व किळसवाणा माणूस होता.हसताना तो तोंडाने एक विशिष्ट आवाज करी,बोलताना अडखळे,रागावला की एखाद्या मूर्खाप्रमाणे वाटेल तसे हातवारे करी.स्वतःच्या मूर्खपणाच्या करमणुकीसाठी त्याने साऱ्या रोमचे जणू सर्कशीत परिवर्तन केले! रोमन लोक त्याच्याकडे सर्कशीतला एक विदूषक या नात्यानेच पाहत.त्याला प्रजेविषयी प्रेम नव्हते व प्रजेलाही त्याच्याबद्दल आदर नव्हता.पूर्वजांप्रमाणे,त्यानेही लोकांस छळण्याचे नाना प्रकार शोधून काढले.जुन्या ग्लॅडिएटर लढाया त्याला फिक्कट वाटत.सम्राटाचे समाधान होण्याइतके मारण-मरण त्यात नसे म्हणून त्या खेळात त्याने अंगावर काटा आणण्यासारख्या आणखी काही प्रकारांची भर घातली.खरोखरच कैद्यांनी भरलेली गलबते टायबर नदीत उभी करण्यात आली व एकोणीस हजार कैदी एकमेकांवर तुटून पडले! ते आपापले प्राण एकमेकांपासून वाचवू लागले.कितीतरी कैदी ठार झाल्यावर ती करमणुकीची लढाई संपली.
तो स्वतःला मोठा खेळाडू समजे.एकदा दोघा ग्लॅडिएटरांनी परस्परांस भोसकून ठार केले तेव्हा त्याने त्यांच्या दोन्ही तलवारींचे नक्षीदार काटे केले;त्या काट्यांनी तो जेवे.जेवताना जणू त्या दोन मृतात्म्यांची तो स्मृतीच करी ! पूर्वीच्या सम्राटांनी आपणाविरुद्ध कट करणाऱ्यांस ठार मारले होते.
क्लॉडियस त्यांच्याही पुढे गेला.त्याच्या मित्रांना पडलेल्या स्वप्नात जे लोक त्याच्याविरुद्ध कट करीत आहेत असे त्यांना दिसे, त्यांनाही तो ठार करी.एखाद्याने जर "माझ्या स्वप्नात अमुक माणूस आला व तो तुमच्याविरुद्ध कट करीत आहे असे मला दिसले" असे सांगितले,तर त्या स्वप्नात दिसलेल्या खऱ्या माणसास लगेच ठार मारण्यात येई. क्लॉडियसच्या मित्रांना आपणास नको असलेले लोक जगातून नाहीसे करण्याला हा फारच सोपा उपाय सापडला होता.
मागील काही पृष्ठांत रोमच्या काही प्राचीन सम्राटांनी केलेल्या अत्याचारांपैकी पाशवी क्रूरतेचे काही प्रकार नमुन्यादाखल दिले आहेत.ते सारे लज्जास्पद आहेतच
पण पुढे नीरोने केलेल्या अनन्वित प्रकारांचा ते प्रकार म्हणजे नुसता प्रारंभच होता.नीरो हा या सर्व तिरस्कारणीय पिशुनांचा अनुकंपनीय मुकुटमणी होता.नीरो हा क्लॉडियसच्या आग्रिप्पिना राणीला तिच्या पहिल्या नवऱ्यापासून झालेला मुलगा. इ.स. ३७मध्ये म्हणजे ख्रिस्ताला क्रॉसवर चढविल्यानंतर चार वर्षांनी तो जन्मला.
पुढे त्याच्या आईने क्लॉडियसशी लग्न केले व ती रोमची राणी झाली.नीरो तेव्हा अकरा वर्षांचा होता.आग्रिप्पिना ही क्लॉडियसची चौथी पत्नी.त्याने पहिल्या दोघींना सोडचिठ्ठी दिली होती व तिसरीला ठार केले होते.
आपलीही तीच गत होऊ नये म्हणून नीरोच्या आईने या नव्या नवऱ्यालाच विष देऊन ठार केले! क्लॉडियस विषप्रयोगाने मेला तेव्हा नीरो सतरा वर्षांचा होता.तो कायदेशीररीत्या गादीचा मालक नव्हता. कारण,
क्लॉडियसला ब्रिटॅन्निकस नामक औरस मुलगा होता.पण बादशहा कोणास करायचे,हे बादशाही गार्डाच्या हाती असे.ते वाटेल त्याची निवड करीत व सिनेटरांना त्याला मान्यता द्यावी लागे.न दिली तर गार्डाच्या तलवारी तयारच असत! राजा मरताच आग्रिप्पिना आपल्या पुत्राला नीरोला घेऊन बादशाही गार्डाच्या मुख्याकडे बुर्व्हसकडे गेली.ती सुंदर व मोहक होती.तिला पावित्र्याची मुळीच चाड नव्हती.बुर्व्हसला चुंबने देऊन व त्याची चुंबने घेऊन तिने प्रार्थना केली व चुंबनांच्या भरीला प्रत्यक्ष भरपूर लाचही दिली.तिने बुर्व्हसलाया दोन प्रकारांनी पटवून दिले की,गादीवर ब्रिटॅन्निकसपेक्षा नीरोचाच हक्क अधिक आहे.
शेवटी मोठ्या समारंभाने सम्राट म्हणून नीरोच्या नावे द्वाही फिरविण्यात आली.ईश्वराने नेमलेला रोमचा सम्राट म्हणून तो गादीवर बसला.ईश्वराची ही इच्छा रोमनांच्या अनुभवास पूर्णपणे यावी म्हणून त्याने ब्रिटॅन्निकसला विष देऊन ठार केले! आग्रिप्पिनाने क्लॉडियसला नव्हते का ठार केले? सुपात्र मातेचा तो सत्पात्र पुत्र होता.
पाच वर्षेपर्यंत राज्यकारभाराची सूत्रे हाती घेण्याची इच्छा त्याने दाखविली नाही,आई,बुहेस व शिक्षक सिनेका यांना राज्यकारभार चालविण्याची त्याने मुभा दिली.तो आपल्या मित्रांसह भरपूर दारू पित राही,सर्व सुखांचा पेला ओठांना लावून बसे.जवळच्या शेतकऱ्यांच्या डोक्यावरील टोप्यांसारख्या टोप्या घालून व वेश बदलून तो व त्याचे मित्र सर्वत्र भटकत,लोकांना ठोकीत,
बदडीत,यथेच्छ दारू पीत व रस्त्यातून जाणाऱ्या येणाऱ्यांस धरून गटारात फेकीत.असल्या बेताल गुंडगिरीच्या एका संचारसमयी नीरोने एका सिनेटराच्या पत्नीवर हल्ला केला तेव्हा त्याने नीरोला मरेमरेतो मारले.
मानवजातीची कथा,हेन्री थॉमस,अनुवाद - साने गुरुजी
तो एखाद्या सामान्य ठगाप्रमाणे खासगी रीतीने व चोरून असा वागत होता,तोपर्यंत रोम जरा सुरक्षित होते.पण त्याच्या आईला त्याचे हे वर्तन पसंत नसे,राज्याचा कारभार आपल्या मुलाने स्वतः सिंहासनावर बसून हाकावा असे तिला वाटत असे.पण नीरो सुखासक्त असल्यामुळे तिच्या म्हणण्याकडे लक्ष देत नसे. क्लॉडियसच्या मृत्यूपूर्वी त्याची मुलगी ऑक्टेव्हिया हिच्याशी नीरोचे लग्न झाले होते.तो रोम शहराची उपेक्षा करी,तद्वतच पत्नीकडेही लक्ष देत नसे.अॅक्टे नामक ग्रीक दासकन्येसह तो उघडपणे राहू लागला. आग्रिप्पिना पूर्णपणे निराश झाली.तिने मुलाला परोपरीने विनवून पाहिले,अॅक्टे हिचा नाद सोडून देण्याबद्दल प्राथून सांगितले,धमक्याही दिल्या;पण कशाचाही उपयोग झाला नाही.राजवाडा कौटुंबिक कलहाची युद्धभूमी बनला.नीरोच्या मित्रांनी व खुशामत्यांनी त्याची बाजू घेतली.ते त्याला म्हणत, "तुझी आई म्हातारी आहे,तिचे काय ऐकतोस? तिच्या हातचे बाहुले नको बनू,असा मागे मागे का राहतोस? स्वतःच्या हाती सत्ता घे.आईचे काहीही चालू देऊ नको." तो मित्रांच्या सल्ल्यानुसार वागू लागला,त्यामुळे मायलेकरांना एकत्र राहणे अशक्य झाले.आग्रिप्पिना राजवाडा सोडून दुसरीकडे राहावयास गेली.
अपुर्ण शिल्लक भाग पुढील लेखामध्ये..!