"जनावर लै हुशार ! छोट्या मालकांना असं कोलवलं की, त्यांना शिंग लागू दिलं नै का इजा होऊ दिली नै."
माई लगेच म्हणाल्या,"मग,आहेच माझी लक्ष्मी गुणाची! "
लक्ष्मीच्या पायगुणांनी वाड्यावरचा गोवंश वाढू लागला होता.एक दिवस बापू ओसरीवर पान खात बसले होते. मंदा,मुक्ता ओट्यावर मारवाड्यांच्या निम्मी,पुष्पाशी ठिक्कर ठिक्कर खेळत होत्या तर यशा त्याच्या मित्रांबरोबर डब्बा ऐसपैसमध्ये मग्न झाला होता. खेळता खेळता त्याला लंगडत वाड्याकडे येणारा टुबुक दिसला.
टुबुकचं खरं नाव कुणालाच माहीत नव्हतं. जेमतेम पाच फूट उंची असलेल्या टुबुकचा एक पाय सहा इंचांनी छोटा होता.
त्यामुळे तो लंगडत लंगडत चालायचा.त्यामुळे सगळं गाव त्याला 'टुबुक' म्हणायचं. टुबुक त्याच्या साथीदाराबरोबर हलकडी जोरदार वाजवायचा.कुस्त्यांच्या आखाड्यात पहिलवानाच्या खालोखाल टुबुकला महत्त्व असायचं.इतर वेळेला तो सिनेमांच्या जाहिरातींच्या त्रिकोणी ढकलगाड्यांसमोर हलकडी वाजवत असे.टुबुक त्याच्या दुडक्या चालीने महादेवाच्या देवळाच्या बाजूने गल्लीत शिरला.
यशा दत्तमंदिरासमोरच उभा होता.टुबुकने त्याच्याकडे बापूंची चौकशी केली.बापू वाड्यात आहेत कळल्यावर तो वाड्यात शिरला.टुबुक आपल्या घरात का गेला ह्या उत्सुकतेने यशाही त्याच्या पाठोपाठ गेला तर चौकात उभा राहून टुबुक बापूंशी अदबीने बोलत होता.
लै देखनी है बघा गावडी,अक्षी चित्रातल्यावाणी. मालकाला पैशाची नड हाय.म्हनून जनावर इक राह्यलाय.हा चांगला मोका हाय भाऊसायब... म्हनत आसाल त आत्ताच घिऊन येतो.एकदा बघून घ्या,मंग ठरवा."
बापूंनी ठाम नकार दिला नाही हे पाहून टुबुक त्यांची संमती अर्धीनिम्मी गृहीत धरून दुडकतच वाड्याबाहेर पडला. तो बाहेर पडताच 'टुबुक गाय आणायला गेला', ही बातमी बापूंनी माईंना आणि यशाने मंदा-मुक्ताला दिली.अर्ध्या तासाने टुबुक गायीचं दावं हातात धरून तिला घेऊन आला.गाय खरोखरच सुंदर होती.
अटकर बांध्याची,मध्यम उंचीची आणि पांढऱ्या स्वच्छ रंगाची. तिची शिगंही छोटी पण रेखीव होती आणि महत्त्वाचं म्हणजे तिच्या कपाळावर पिंपळपानाचं शुभचिन्ह होतं! बघताच गाय सर्वांनाच आवडली.आधी माई आणखी एक गाय सांभाळायला नाखूश होत्या.कारण त्यांचं काम आणखी वाढणार होतं पण गायीला पाहताच त्यांचा विरोध मावळला.टुबुकने तिचं नाव पार्वती असल्याचं सांगितलं.यशाला तर ती चांदोबा मासिकातल्या चित्रांत दाखवतात तशी देखणी वाटली.
टुबुक म्हणाला,"भाऊसायब,गाय एकदम गरीब हाय बरं का ! पोरांना तिच्या खालून जायला सांगा,ती कायबी करनार न्हाई.
फकस्त एक डाव कुंपनावरून उडी मारताना तिच्या सडाला लागलं होतं तवापासून पान्हा फुटल्यावर आपोआप दूध टपकायला लागतं."
टुबुकच्या सांगण्यावरून मंदा-मुक्ता दोघीही मांडवाखालून जावं तसं तिच्या खालून गेल्या.ती शांतच उभी होती.एकदा तर यशाने आगाऊपणा करून तिच्या खालीच आडवं पडून सडाला काही जखम दिसते का ते सड ओढून पाहिलं.त्यावेळी तिने हलकेच पाय उचलला. पार्वती वाड्यावर आली त्यावेळी ती गाभण होती. त्यामुळे माईंनी तिची काळजी बाळंतपणाला माहेरी आलेल्या लेकीसारखी घेतली.
थोड्याच दिवसांत पार्वती गोठ्यात रुळली.मुख्य म्हणजे तिचे त्या तिरसट लक्ष्मीशी चांगले सूर जुळले.अर्थात पार्वती इतकी गुणी होती की,तिच्याशी कुणीही वाकुडेपणा केला नसता.माईंच्या सकाळच्या गोठ्यातल्या गप्पांना आता आणखी एक नवीन सखी आणि नवीन विषय मिळाला.पार्वतीच्या पोटावरून हात फिरवत लेकीशी बोलावं तसं माई बोलत,"पार्वती,बाई, तू काही चिंता करू नकोस.काहीही होऊ दे.आपल्या घरात मुलगा आणि मुलगी असा फरक अजिबात करत नाहीत.आणि हो,गोठ्यात लक्ष्मीचा नंद्या आहेच ना. त्यामुळे तुला कालवड झाली तरी चालेल !"
लक्ष्मीप्रमाणेच ह्या पार्वतीला माईंचं बोलणं कितपत कळत होतं कोण जाणे.मात्र माईंच्या गोड आवाजातलं बोलणं आणि माईंनी आपला मऊ हात तिच्या अंगावरून फिरवणं तिला नक्कीच छान वाटत असणार. कारण ती माईचा हात,अंग आपल्या खरखरीत जिभेने चाटे.माईंच्या अंगाशी आपलं अंग घासे.लक्ष्मीपण पार्वतीशी समजुतीने वागे.नंद्याला पार्वतीच्या जवळ उड्या मारू देत नसे.
एका रात्री माईंनी यशाला उठवलं."यशा बाळा, गवळीवाड्यात जाऊन दामूला जरा बोलावून आण. बापूच गेले असते पण इथे माझ्या मदतीला कुणी असलेलं बरं.दामूला म्हणावं,
पार्वती टेकीला आलीय. लवकर ये.आणि हो,दामूबरोबर चोंबड्यासारखा तूही मागे गोठ्यात येऊ नकोस.
बायामाणसांना लाज वाटते. त्या अंग आखडून घेतात." दामू आला आणि तासाभरात पार्वती मोकळी झाली.पार्वतीला कालवड झाली होती.गोऱ्याधप्प पार्वतीची पोर मात्र काळसर करड्या रंगाची होती. पार्वतीच्या आजूबाजूचं आवरून झाल्यावर माईंनी यशाला गोठ्यात बोलावलं.यशा आल्यावर माई त्याला म्हणाल्या,
"यशा,रात्रीच्या अंधारात गवळीवाड्यात जाऊन दामूला वेळेवारी बोलावून आणलंस हो.आता कालवडीचं नाव काय ठेवायचं ते तुम्ही तिघं मिळून ठरवा."
यशा चटकन् उत्तरला,"नाव तर आम्ही आधीच ठरवून टाकलंय.कालवड झाली तर तिचं नाव सोमी ठेवायचं म्हणून."
बापू म्हणाले,"मंजूर ! झालं तिचं बारसं.देवा,आता दामू आहे तोवर पार्वतीसाठी बाजरी शिजवायला लावा.गूळ घालून तिला खायला घालायला सांगितलंय."
"आणि हो,उद्यापासून दुधासाठी तिला काथबोळपण सुरू करायला हवा. बरं,आता मी चहा टाकते. बाळंतपण करून दामूपण दमला असेल." माईंनी म्हटलं.
अशा रीतीने वाड्यावर लक्ष्मी,पार्वती,नंद्या आणि सोमी असं एक कुटुंब तयार झालं.लक्ष्मी-पार्वतीमुळे दूधदुभतं मुबलक झालं,गोठा समृद्ध झाल्याने वाड्याच्या मागच्या भागालासुद्धा पूर्णत्व आलं.
हौशा-नाच्याच्या खरेदीच्या वेळला मात्र माईंनी आपल्या स्वभावाच्या विरुद्ध प्रचंड विरोध बापूंना केला. 'बैलजोडीची आपल्याला काय गरज आहे,जरूर पडते त्यावेळेला सुखदेव गावातून कुणाचे तरी बैल आणून वेळ निभावून नेतो ना? उगाच खायला काळ नि भुईला भार.तुमचे रिटायरमेंटचे पैसे मिळाले आहेत ते तुमच्या खिशात उड्या मारताहेत,ते संपवल्याशिवाय तुम्हाला काही चैन पडणार नाही.मुलं लहान आहेत.अडीअडचणीसाठी पोष्टात ठेवून द्या.तेवढेच महिन्याच्या किरकोळ खर्चाला चार पैसे मिळतील...' वगैरे.
पण ऐकतील ते बापू कसले! त्यांच्या मनात एखादी गोष्ट आली की,ती केल्याशिवाय त्यांना चैनच पडत नसे शिवाय आपण ती गोष्ट का करतो आहोत,ह्याची सयुक्तिक कारणं त्यांच्याकडे तयार असत.
"देवा,तुम्हाला समजत नाही.सुखदेवचा असा तिरपगडा स्वभाव.सगळा गाव त्याच्या विरुद्ध ! दरवेळेला बैलांसाठी गावातल्या कुणाची तरी मनधरणी करावी लागते.शिवाय जमीन काही आपण विकत घेतली नाही. आपल्या घराण्याला इनाम मिळालेली आहे.तिच्या मशागतीसाठी आपण थोडाफार खर्च करायला नको काय? आणखी एक म्हणजे,शेताची कामं नसतील तेव्हा बैलगाडी इथेच आपल्या वाड्यावर राहील.कुठे जायला-यायला उपयोगी पडेल."
नेहमीप्रमाणे माईनी अखेर बापूंच्या प्रस्तावाला होकार दिला.
हौशा-नाच्याची जोडी घरी आली.दोघेही धप्प पांढरे होते.पण तेवढं सोडलं तर जोडी म्हणून ते एकमेकांना फारसे साजेसे नव्हते.
हौशा छोट्या शिंगांचा, अटकर बांध्याचा आणि मध्यम उंचीचा होता.नाच्या मात्र मोठ्या शिंगांचा नि उंचापुरा होता.उंचीला तो हौशापेक्षा फूटभर तरी उंच होता.हौशा त्याच्या जोडीने पळायचा. ताकदीलाही चांगला होता.पण नाच्याची गोष्टच वेगळी. त्याची ताकददेखील अफाट होती.
एकदा बाबू तांगेवाल्याला अनकाईच्या यात्रेला जायची इच्छा झाली.तो बापूंशी बोलता बोलता म्हणाला,
"माझा एक घोडा थोडा आजारी आहे.भुऱ्याबरोबर नाच्याची जोड देऊन तांगा काढू या का? तुम्ही सगळे आणि मी.दहाबारा मैलांचं तर अंतर."
बापू म्हणाले "चला,बघू या आमचा नाच्या तुझ्या भुऱ्याला किती पुरा पडतो ते!"
बाबूच्या भुऱ्याघोड्याच्या जोडीला नाच्याला तांग्याला जोडलं.
नाच्याला बहुधा हे आपल्याला चॅलेंज आहे हे समजलं असावं.
त्याने जी ऽऽऽ धावायला सुरुवात केली ती थेट अनकाईला जाऊन परत घरी येईपर्यंत! त्याने भुऱ्याच्या तोंडाला चांगलाच फेस आणला.
एकदा माईंच्या डोक्यात आलं,नवरात्रीनंतर कोटमगावला गेलो नाही.आता घरची गाडी आहे तर देवीचं दर्शन करून येऊ या.हल्ली काही दिवस घरातल्या भाऊबंदकीमुळे बापूंचाही मूड कधी कधी ठीक नसे.म्हणूनही माईंनी कोटमगावला जायची टूम काढली असावी.बापू माईंच्या इच्छेला कधीच मोडता घालत नसत.बापूंनी यशाला गाडी जोडून दिली.कासरा त्याच्या हातात देऊन रस्त्याच्या कडेकडेने गाडी घ्यायला सांगितली.गाडी कोटमगावच्या रस्त्याला लागली. रस्त्यात प्रकाशचा भत्ता आणि महेशकडची जिलेबी बरोबर घेतली.शेटजीचा बाग ओलांडला आणि यशाच्या निरीक्षणात एक गोष्ट आली.हौशापेक्षा नाच्या फूटभर उंच असल्याने गाडीचं जू त्याच्या मानेवर जास्तच टेकलं जातंय.
हौशाला कमी उंचीचा फायदा मिळत होता. गाडीचं जास्तीत जास्त वजन नाच्यालाच खेचावं लागत होतं.यशाने ही गोष्ट बापूंना सांगितली.इतक्या वेळ गप्पा मारणारे बापू अचानक स्तब्ध झाले.कुठेतरी शून्यात बघत ते म्हणाले,
"यशा,मोठं असण्याचा हा परिणाम आहे बाबा! मोठ्यावर जास्त वजन पडतं.गाडीचा जास्त बोजा त्यांना ओढावा लागतो आणि लोकांनापण हळूहळू मोठ्याकडून तशीच अपेक्षा वाटत राहते."
बापूंच्या बोलण्याचा रोख माईंच्या लक्षात आला. त्या समजुतीच्या सुरात म्हणाल्या,"मोठ्याची ताकद जास्त. त्याला मिळणारा मानही मोठा.तसंच त्याच्यावरचा संसाराचा भारही जास्त.छोट्यांना बरोबर घेऊन चालण्याने गाडा व्यवस्थित चालतो अन् संसाराचा तोलही सांभाळला जातो."
बापू खळखळून हसत म्हणाले,"सरकार,मी नेहमी म्हणतो,तेच खरं आहे.तुम्ही वकील व्हायला पाहिजे होतं ! तुमचं म्हणणं तुम्ही मॅजिस्ट्रेटला बरोबर पटवून दिलं असतं."
आकाशातलं मळभ बाजूला झालं आणि मंडळी हसतखेळत देवीच्या मंदिराकडे दौडू लागली.
शेतीच्या कामानुसार हौशा,नाच्या कधी वाड्यावर तर कधी शेतावर असत.पोळा जवळ आला तेव्हा ते दोघेही शेतावरच होते.सुखदेवने बापूंना सांगितलं की, 'पोळ्याच्या मिरवणुकीत धाकट्या धन्यांना पाठवून द्या.' तेव्हापासून यशा पोळा कधी येईल,म्हणून दिवस मोजत होता.पोळ्याचा आदला दिवस होता.वर्गात शेवटचा तास चालू होता.मास्तर घरून करून आणायचा अभ्यास लिहून देत होते.पण कुणाचंच त्यांच्याकडे लक्ष नव्हतं. प्रत्येक जण उद्याचा पोळा कसा साजरा करायचा, ह्याबद्दल शेजारच्या मित्राशी बोलत होता.घंटा वाजली अन् यशा घराकडे झिंगाट पळत सुटला.
दुडक्या चालीने घराकडे पळताना यशाच्या डोक्यात काल रात्रीचं बापूंचं बोलणं येत होतं.पोळ्याच्या निमित्ताने शहरात कॉलेजमध्ये शिकणारा यशाचा अशोकभाऊ त्याच्या मित्रांना पोळा दाखवायला घेऊन आला होता.बापू त्याला दुसऱ्या दिवशी बाजारातून पोळ्यासाठी आणायच्या सामानाची यादी सांगत होते. कवड्यांच्या माळा,शिंगांसाठी पितळी शेंब्या,गळ्यात बांधायला घंटा आणि अंगावर छापे मारायला हिंगुळ. आपण लवकर घरी पोहचलो नाही तर दादा मित्रांबरोबर खरेदीला निघून जाईल ह्या विचाराने यशाने आपला वेग वाढवला.
दुसऱ्या दिवशी सकाळी दादा आणि त्याच्या मित्रांबरोबर गावी शेतावर जाण्यासाठी एसटी स्टँडवर जायला यशा निघाला तेव्हा यशाला पोटाशी धरत माईंनी बजावलं, "मागेच राहा.
फार पुढे गेलास तर बैलांच्या मध्ये सापडशील आणि तुम्ही रे - तुमच्याच नादात राहू नका. लहान पोर आहे बरोबर ह्याचं भान ठेवा!"
दादाने होकारार्थी मान डोलवली.सहा मैलांवरच्या गावातल्या शेतावर पोहचल्यावर खोपटात सामान टाकून सारेच उधळले.
हौशा-नाच्याच्या जोडीपैकी दादाने नाच्या स्वतःकडे घेत हौशाचा कासरा यशाच्या हातात दिला. सुखदेवचा मुलगा श्रीपती ह्याच्या मागोमाग बांधावरून चालताना सगळेच खुशीत आले होते.
नुकत्याच पडलेल्या पावसाने सगळा आसमंत हिरवागार झाला होता.जनावरांनापण आज त्यांचा खास दिवस आहे हे जणू कळत होतं.मधूनच डुरक्या मारत जमीन पायांनी उकरत तेही मोठ्या डौलाने चालले होते.डोहाच्या शेजारी बैलांना पाण्यात उतरवून धुण्याची धूम सुरू झाली होती.यशाने खिशातून काथ्याची गुंडी काढली आणि तिने तो हौशाला घासू लागला.
बैल स्वच्छ धुऊन झाल्यावर खळ्यात दादा आणि त्याचे मित्र,
नाच्या आणि इतर बैलांना सजवत होते.हौशाचा ताबा फक्त यशाकडे होता.ओल्या हिंगुळात हात बुडवून हौशाच्या अंगावर हाताचे छापे मारताना हौशाचं अंग दरवेळी शहारत होतं.ते पाहून यशालाही आनंदाचं भरतं येत होतं.शेंब्या लावून,कवड्यांच्या माळा घालून हौशा-नाच्याची जोडी झकास दिसत होती.
दुपारी पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून (आणि बैलांची पूजा करून) संध्याकाळी सगळं गाव सतीच्या माळावर जमलं.भुरभुरत्या पावसात सगळीच जनावरं,खिल्लारं ओढ घेत होती.डुरक्या देत जमीन उकरत होती. एकमेकांना दुशा देत होती.रेस सुरू झाली की, वेशीपर्यंत दौडत जायचं अन् वेशीला बांधलेली मोठी माळ तोडायची.त्या माळेचा तुकडा मिळवणं मानाचं समजलं जायचं.ही सगळी माहिती आपल्या मित्रांना देता देताच दादा यशाला म्हणाला,
"यशा,ह्या धबडग्यात शिरू नकोस.हौशाचा कासरा ओढून धर आणि एकदम भागे राहा बरं.मी देईन तुला माळेचा तुकडा !"
यशाने नाराजीने मान हलवली.
आजूबाजूच्या गर्दीचा गोंगाट वाढला.शेमले उडू लागले. धुळीने वातावरण कुंद झालं.बैलांनी डुरक्या मारून गोंगाटात मोठीच भर घातली.पंचांच्या इशाऱ्याबरोबर गुरवांनी शिंग फुंकलं.एकच धूम झाली.प्रत्येक जण बैलाबरोबर वेशीकडे धावू लागला.हौशानेही त्याच्या छोट्या मालकाला घेऊन गर्दीत मुसंडी मारली.दादाच्या सूचना विसरून यशाही स्पर्धेत उतरला.वेस पार करून नाच्याच्या शेजारी उभ्या असलेल्या दादाने पाहिलं तर हातात माळेचा तुकडा घेऊन यशा बेभान नाचत होता. हौशाला थोपटत होता.त्याचे पापे घेत होता.दादाने कौतुकाने यशाला जवळ घेतलं आणि ठिकठिकाणी खरचटलेल्या यशाच्या डोक्यावर थोपटत अभिमानाने आपल्या मित्रांकडे पाहिलं.
… समाप्त..!!