* विजय गायकवाड | Vijay Gaikawad

live

नमस्कार आपले स्वागत आहे. मी पुस्तके आणि मित्रांवर पैसे खर्च करतो,माझ्याकडे दगड आणि विटांवर खर्च करण्यासाठी पैसे नाहीत.- रस्किन बाँड.ही थोर माणसं व त्यांचे विचार मला पुस्तकात भेटलीत.ती भेटली आणि त्यांनी सांगितले कि, प्रत्येक दिवशी असं काही तरी करा की,ते तुम्हाला अधिक सुंदर उद्याच्या दिशेने खूप लांबवर घेऊन जाईल."- डोग फायरबाऊ.' सर्वियन कादंबरीकार मिलोराद पावीच यांचे एक वाक्य आहे ते म्हणतात - जोवर जगात पुस्तक वाचणाऱ्या वाचकांची संख्या बंदूकधारी सैनिका पेक्षा अधिक आहे तोवर काळजीच काहीच कारण नाही.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात.पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये.म्हणून अविरतपणे प्रयत्न करणारे मार्गदर्शक, मित्र धावून येतात.प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,डॉ.दीपक शेटे,आ.भरत बुटाले,प्रा.सर्जेराव राऊत,सुभाष ढगे,अनिल फारणे,डॉ.सुधीर सरवदे ,विश्वास खाडे, विनायक पाटील,संजय कुंभार,सतीश खाडे,मनोहर सुर्वे,गणेश खंदारे,तात्या गाडेकर, दादासाहेब गाडेकर, दादासाहेब ताजणे, पुस्तकातील घटना प्रसंग सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील यांनी केलेले आहे. मला लिहिण्याची प्रेरणा देणारी पुस्तके,लेखक,प्रकाशक,मित्र ही जगावेगळी माणसं माझ्या जीवनातील महत्वाचा टप्पा आहेत.... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ.मेघा गायकवाड, चिरंजीव मयान,माझ्या धावण्यातील गुरुवर्य नामदेव बरुरे,लुल्ला शेख मोठी ताई ,लहान ताई जयश्री शिंदे या सर्वांचेच मनापासून आभार व धन्यवाद मॅट्रिक फेल विजय गायकवाड

4/11/26

बर्फाळ बेटावरचा संघर्ष Clash on the Ice Island

चार संशोधकांची मदतनीस म्हणून उत्तर ध्रुवाजवळील निर्जन बेटावर गेलेल्या एका एस्किमो महिलेवर अखेरीस एकटीनेच जीव तगवण्याची वेळ येते.केवळ बफनि व्यापलेल्या त्या प्रदेशात तिचा कसा टिकाव लागतो त्याची गोष्ट.....!!


अ‍ॅडा ब्लॅकजॅक


१० सप्टेंबर १९२१ रोजी अलास्काच्या नोम शहरातून 'सिल्व्हर वेव्ह' नावाचं जहाज रंगल बेटाच्या दिशेने कूच करतं तेव्हा अ‍ॅडा ब्लॅकजॅकच्या मनात काहर माजलेलं असतं.

रँगलसारख्या उत्तर ध्रुवाजवळच्या निर्जन आणि बर्फाचं वाळवंट असणाऱ्या बेटावर वर्षभर मुक्काम ठोकण्याचा वेडेपणा आपण कसा काय करू शकतो हे तिला अजूनही कळत नसतं.अनाथाश्रमात वाढणाऱ्या आजारी मुलासाठी पैशांची गरज नसती तर तिने हे पाऊल कधीही उचललं नसतं. अ‍ॅडा एस्किमो असते;पण लहानपणी बहुतेक काळ मिशनरी शाळेत काढल्यामुळे बर्फाळ प्रदेशात टिकून राहण्याचं उपजत ज्ञान तिच्याकडे जवळपास नसतंच. इतर एस्किमो स्त्रियांप्रमाणे ती चांगली शिलाई करू शकत असते आणि मिशनरी शिक्षणामुळे तिला मोडकंतोडकं का होईना,इंग्रजी लिहिता-बोलता येत असतं एवढंच..


.. रँगल बेटाकडे निघालेल्या मोहिमेत तिचा समावेश होण्याचं कारण तेच असतं - इंग्रजीची तोंडओळख आणि शिंपिणीचं कसब.कॅनडाचा एक्सप्लोरर विल्हामुर स्टीफन्सन याने आखलेल्या या मोहिमेत चौघा साहसवीर संशोधकांनी भाग घेतलेला असतो.या मोहिमेचा प्रमुख असतो अ‍ॅलन क्रॉफर्ड हा २० वर्षांचा कॅनेडियन तरुण,त्याच्या सोबत लॉर्न नाइट (वय २८), फ्रेड मॉरर (वय २८) आणि मिल्टन गेल (वय १६) हे तिघं अमेरिकी या मोहिमेचा भाग असतात.रँगल आयलंडवर वर्षभर मुक्काम ठोकून तिथल्या परिस्थितीचा,दगड-मातीचा, प्राण्यांचा,

वनस्पतींचा, बदलत्या हवामानाचा अभ्यास करण्याची जबाबदारी त्यांच्यावर असते.शिवाय या बेटावर हक्क कुणाचा यासाठीही त्या काळी स्पर्धा सुरू असते.ब्रिटिश साम्राज्याचा भाग असलेल्या कॅनडामधील स्टीफन्सनला ब्रिटिशांसाठी या बेटावर हक्क प्रस्थापित करण्याची महत्त्वाकांक्षा असते.


या निर्जन बेटापर्यंत पोहोचणं आणि पुढे तिथे राहणं सोपं नसतं.हे तरुण वर्षभर तिथे राहू शकले तर रँगल बेटावर हिवाळा काढणारे ते पहिले मानवप्राणी ठरणार असतात.


पण माणसांनी जगण्यासाठी पूर्ण प्रतिकूल अशा बेटावर राहायचं तर त्यांना एस्किमोंची मदत घेणं भाग असतं. शिकार करायला,

प्राण्यांचं मांस शिजवून स्वयंपाक करायला,जळणासाठी लाकडं फोडायला आणि मुख्य म्हणजे या प्राण्यांच्या कातड्याचे कपडे शिवायला एस्किमो कुटुंब सोबत असणं आवश्यक असतं.त्यानुसार स्टीफन्सनने आपल्या नोममधल्या एजंटांकरवी काही एस्किमोंशी बोलणी करून ठेवलेली असतात;पण प्रत्यक्षात जाण्याची वेळ जवळ येते तसे अ‍ॅडा सोडून सगळे एस्किमो या मोहिमेकडे पाठ फिरवतात.या बेटाची कीर्तीच तशी असते.एक तर हे बेट कुणालाही जवळ येऊ देत नाही आणि कुणी जवळ गेलंच तर त्याला पुन्हा परत सोडत नाही,असं एस्किमोंमध्येही बोललं जात असतं.ही मोहीम धोकादायक आहे आणि एकदा त्या बेटावर गेलं की माणूस जिवंत परतणार नाही,अशी भीती सरसकट सगळ्या एस्किमोंना वाटत असते.अ‍ॅडाच्या मनातही ती भीती असतेच.एकीकडे पैशाची आत्यंतिक गरज आणि दुसरीकडे मृत्यूच्या खाईत नेणारी मोहीम,अशा कात्रीत अ‍ॅडा

सापडलेली असते.आपण परत आलो नाही तर आपल्या मुलाचं पुढे काय होईल याची कल्पनाही तिला करवत नाही.दुसरीकडे,

मोहिमेला गेलो नाही तर जगण्यासाठी आणि मुलाला उपचार देण्यासाठी पैसे कुठून आणणार हा तिच्यापुढचा प्रश्न असतो.शेवटी मनावर दगड ठेवून अ‍ॅडा मोहिमेसाठी तयार होते.


सिल्व्हर वेव्ह जहाजावर या मोहिमेला लागणारी रसद भरली जाते.खाद्यपदार्थ,लिखाण आणि संशोधन साहित्य,हत्यारं, दारूगोळा,स्वयंपाकाची भांडी,शिया आणि ध्रुवीय कुत्री हे सगळं सामान आणि मोहिमेच्या सदस्यांना बेटावर सोडून जहाज पुन्हा नोमला परतणार असतं.एकदा का जहाज परत गेलं की पुन्हा मानवी वस्तीकडे परतण्याचं,एवढंच काय,तिकडे एखादा निरोप पाठवण्याचंही कोणतं साधन या मोहीमवीरांकडे असणार नसतं.एका अर्थाने ही हाराकिरीच. 


मोहिमेतल्या चौघा साहसवीरांनी ती स्वच्छेने पत्करलेली असते.अ‍ॅडासाठी मात्र ती नाइलाजाने स्वीकारलेली काळ्या पाण्याची शिक्षा असते.


१० सप्टेंबरला निघून सिल्व्हर वेव्ह जहाज १६ सप्टेंबरला रँगल बेटावर पोहोचतं.मोहीमवीर आणि जहाजावरचे खलाशी मिळून सामान बेटावर उतरवतात.


चौघंही आपापल्या घरी पाठवण्यासाठी शेवटची पत्रं लिहून जहाजाच्या कप्तानाकडे सोपवतात.आता जहाजाचा निरोप घेण्याची वेळ झालेली असते.चौघंही तरुण अतिशय आनंदात आणि रोमांचित अवस्थेत असतात.आपलं नाव इतिहासात कोरलं जाणार असल्याची जाणीव त्यांची छाती रुंद करत असते,तर इकडे अ‍ॅडा मात्र त्यांच्यापासून दूर धाय मोकलून रडत असते.आत्ताच्या आत्ता पळत जावं,जहाज थांबवावं नि या चौघांची माफी मागून नोमला परतावं,हा विचार तिच्या मनाचा ताबा घेऊ लागलेला असतो.आता आपला मुलगा पुन्हा कधीच दिसणार नाही,या जाणिवेने तिचं काळीज लक लक करत असतं.पण अचानक तिच्या मनात विचार येतो,'मीही निघून गेले तर या तरुण वेड्यांची काळजी कोण घेईल? त्यांचे कपडे कोण शिवेल? त्यांच्यासाठी जेवण कोण रांधेल? मला थांबायलाच हवं.' डोळ्यांतले अश्रू थोपवत अ‍ॅडा दूर होत जाणाऱ्या जहाजाकडे पाहत राहते.


जहाज गेल्यावर चौघंही झपाट्याने कामाला लागतात. राहण्यालायक आणि सामान ठेवण्यासाठी निवारे उभारणं हे त्यांचं पहिलं काम असतं.एक खोपटं राहण्यासाठी आणि एक सामान ठेवण्यासाठी.सलग १६ तास काम केल्यावर त्यांचे निवारे उभे राहतात.रँगल बेटाच्या या भागात नावालाही झाडं नसली तरी समुद्रातून वाहत आलेल्या लाकडांचा तिथे खच पडलेला असतो.

त्यांचा वापर करून घरं बांधली जातात.बर्फ पडायला सुरुवात झाली की बर्फाच्या भिंती उभारून घरं आणखी पक्की करण्याचा त्यांचा इरादा असतो.एस्किमो न मिळाल्याने सगळी कामं या चौघांनाच करावी लागतात.राहण्याची तात्पुरती व्यवस्था झाल्यावर लवकरच त्यांचा दिनक्रम ठरून जातो.


चौघंही तरुण रोज सकाळी उठून बेटाच्या अभ्यासाला बाहेर पडतात.जवळपासची टेकाडं पालथी घालायची, वनस्पतींचा अभ्यास करायचा,नमुने घ्यायचे,प्राण्यांची मोजदाद करायची आणि सँपल्स घेऊन दुपारपर्यंत कॅम्पकडे परतायचं,असा त्यांचा उद्योग ठरून जातो.कॅम्पवर आणखी कामं वाट बघत असतातच. सुरुवातीला उभे केलेले निवारे हे किमान गरजा भागवणारे असतात.त्यात सुधारणा,दुरुस्त्या,डागडुजी करण्याचं काम बराच काळ चालू राहतं.शिवाय ते करत असलेल्या अभ्यासाच्या,

आसपास दिसणाऱ्या परिसराच्या आणि रोज घडणाऱ्या छोट्या-मोठ्या घटनांच्या नोंदी आपापल्या वहीत करणं हे एक महत्त्वाचं काम असतं.अ‍ॅडापूर्णवेळ स्वयंपाकात तरी गुंतलेली असते किंवा काही ना काही शिवत तरी असते.


जसजसे दिवस जातात तसतशी रँगल बेटावरच्या या पाच रहिवाशांचीएकमेकांशी ओळख होत जाते. एकमेकांचे स्वभाव,त्यातल्या खाचाखोचा कळू लागतात.क्रॉफर्डला फालतू विनोद सांगायला आवडतात.नाइट चित्रविचित्र कविता रचत असतो.अ‍ॅडा नेहमी कोणत्या तरी प्रार्थना पुटपुटत असते आणि गेल कोणत्याही वेळी आपल्या वहीत किंवा टाइपरायटरावर काही तरी लिहित असतो.मॉररला शंभरशेसाठ औषधं घेण्याचा नाद असतो.डोकेदुखी, चक्कर,अपचन,बद्धकोष्ठ अशा कोणत्या ना कोणत्या तक्रारीवरची गोळी घेतल्याखेरीज त्याला झोप लागत नसते.


एकुणात त्यांचं छान चाललेलं असतं.स्वयंपाकघराच्या कोठीत भरपूर खाद्यपदार्थ असतात,शिवाय शिकार करण्यासाठी प्राणीही.ध्रुवीय अस्वलं,सील,कोल्हे, वॉलरस हे प्राणी आणि घुबड,सीगल,कावळे असे काही पक्षी या मंडळींना रोज दिसत असतात.जसा हिवाळा सुरू होईल तशी विशेषतःव्हाइट सील्सची संख्या वाढेल,असा ध्रुवीय प्रदेशाचा अनुभव असलेल्या नाइट आणि मॉरर यांचा होरा असतो.याचा अर्थ अन्न कमी पडण्याची शक्यता नाही.खरं तर चौघांपैकी कोणालाच बंदूक चालवण्याची किंवा शिकारीची फारशी माहिती नसते.पण शिकार करण्याखेरीज दुसरा इलाजही नसतो. त्यामुळे हळूहळू सगळेच हात साफ करून घेतात. पहिले काही दिवस नेम चुकतात,गडबड उडते;पण नंतर जमतं.बेटावर दाखल झाल्यानंतर आठ दिवसांत त्यांना अस्वलाची जंगी शिकार मिळते.एस्किमो अ‍ॅडासाठी शिकार नेहमीची असणार असा इतरांचा समज असतो; पण प्रत्यक्षात शिकार करणं तर दूरच,तिला बंदुकीच्या आवाजाचीही भीती वाटत असते.म्हणजे या कामी तिची काही मदत होणार नाही हे स्पष्ट होऊन जातं.


मृत्यू पाहिलेली माणसं,मृ त्यू च्या दारातून परतलेल्या व्यक्तींच्या थरारक कहाण्या,संकटांच्या वावटळीत तग धरून राहणाऱ्या सामान्यांमधल्या असामान्यांना,गोरी कानेटकर,समकालीन प्रकाशन


ते दाखल झाल्यानंतर काही दिवसांतच हिम पडायला सुरुवात होते.ते एवढं वाढतं की आठ दिवस सर्वांना घरातच अडकून पडावं लागतं.लागोपाठ त्यांच्यावर ध्रुवीय वादळाचं संकट येऊन आदळतं.दिवसेंदिवस पाचहीजण त्यांच्या छोट्या घरात अडकून पडतात.रँगल आयलंडने आपले खरे रंग दाखवायला सुरुवात केलेली असते.


या काळात पहिल्यांदा त्यांना अ‍ॅडाच्या वागण्यात काही तरी बदल जाणवू लागतो.आधी तो कळत-नकळत असतो.कधी ती आढ्याकडे बघत राहिलेली दिसते,तर कधी एकटीच मुसमुसत असल्याचं कुणाच्या तरी लक्षात येतं.पण नंतर मात्र त्याचं रूपांतर घळाघळा आणि कधी कधी धाय मोकलून रडण्यात होत जातं.


पुढे पुढे तर काम करत असताना पूर्ण वेळ ती रडतच असते.किंवा कधी काम सोडूनही.या तरुण मुलांना तिच्याबद्दल फारसं काही माहीत नसतं.तिचा घटस्फोट झालाय आणि मुलाच्या उपचारांसाठी तिला पैशांची गरज आहे, एवढंच त्यांना कळलेलं असतं.ती कशामुळे रडतेय, तिला काय होतंय हे विचारण्याचा ते प्रयत्न करत असतात;

पण बहुतेक वेळा त्याचा उपयोग होत नसतो.लवकरच आणखी एक गोष्ट त्यांच्या ध्यानात येऊ लागते.अ‍ॅडाच्या मनात क्रॉफर्डबद्दल एक हळवा कोपरा तयार झालाय.ती झपाट्याने त्याच्याकडे ओढली जातेय.तिच्या मनात क्रॉफर्डबद्दल आकर्षण निर्माण होणं साहजिक असतं.मॉरर हा त्यांच्यातला थोडा वडीलधारा आणि अलिप्त असतो.नाइट असतो बोलघेवडा,पण बराचसा आक्रमक.अ‍ॅडाला त्याची काहीशी भीतीच वाटत असते.

गेल तर अगदीच लहान मुलगा असतो.तरुण अ‍ॅडाला तो लहान भावासारखा वाटत असतो.त्यामुळे आपलं सारं लक्ष अ‍ॅडाने क्रॉफर्डवर केंद्रित केल्यास आश्चर्य नसतं.हे सगळं गमतीत चाललेलं असतं तर प्रश्न नाही;पण अ‍ॅडाने काम थांबवून रडत बसणं किंवा क्रॉफर्डसाठी झुरणं त्यांना परवडणारं नसतं.

रँगलसारख्या बेटावर तर ते जीवघेणंच ठरणार असतं.त्यामुळे तिला समजावण्याचे,धमकावण्याचे सगळे प्रयत्न ते करून पाहतात;पण व्यर्थ.


या कथेतील तीन भागापैकी पहिला भाग …।

4/9/26

पक्षिशास्त्रज्ञ अ‍ॅरिस्टॉटल / Ornithologist Aristotle

पक्षिशास्त्रज्ञ अ‍ॅरिस्टॉटल / Ornithologist Aristotle

सॉक्रेटिसचा शिष्य प्लेटो व प्लेटोचा शिष्य अ‍ॅरिस्टॉटल अशी अभूतपूर्व गुरु-शिष्याची परंपरा दृष्ट लागण्यासारखी आहे,पण अ‍ॅरिस्टॉटल मात्र नुसताच तत्त्ववेत्ता नव्हता,तर जगातील एक थोर चिंतनशील निसर्गज्ञानी होता,

पक्षिशास्त्रज्ञ म्हणून तर त्याचं कार्य फार मोठं आहे.

अशा या थोर पुरुषाचा जन्म अथेन्समधील स्टगिरा येथे इ. स. पूर्वी चौथ्या शतकात झाला.त्याचे वडील निकोमॅकस,अ‍ॅलेक्झांडरच्या आजोबांचे राजवैद्य होते. लहान असतानाच अ‍ॅरिस्टॉटल पोरका झाला.त्याच्या वडिलांचे जिवलग मित्र प्रोझेनस यांनी त्याला लहानाचं मोठं केलं.आयुष्याच्या पूर्वार्धात तो संरक्षण विभागात नोकरीस होता.परंतु युद्ध व त्या अनुषंगानं होणारी माणसांची हत्या यांचा उबग येऊन त्यानं ती नोकरी सोडली.उदरनिर्वाहाकरिता तो अथेन्स येथे औषधं विकत असे.एका ज्योतिषानं त्याला,अथेन्स येथे तत्त्वज्ञानाचा अभ्यास केल्यानं त्याचा भाग्योदय होईल, असं सांगितल्यावरून तो वयाच्या सतराव्या वर्षी प्लेटोच्या पाठशाळेत विद्यार्जनासाठी जाऊ लागला,

तेथे त्यानं तत्त्वज्ञानाचा सखोल अभ्यास केला.प्लेटोचा तो लाडका विद्यार्थी होता.प्लेटो कित्येकदा म्हणत असे की, माझ्यानंतरची परंपरा अ‍ॅरिस्टॉटल चालवील.गुरूचा आशीर्वाद खरा ठरला.त्याची कीर्ती झपाट्यानं ग्रीस देशात पसरली.ही वार्ता त्या काळी राज्य करीत असलेल्या अ‍ॅलेक्झांडरच्या वडिलांच्या कानावर गेली. त्यानं अ‍ॅरिस्टॉटलची नियुक्ती युवराज अ‍ॅलेक्झांडरचे शिक्षक म्हणून केली.त्या वेळी अ‍ॅरिस्टॉटल बेचाळीस वर्षांचा व युवराज अवघा पंधरा वर्षांचा होता.

बारा वर्षांहून अधिक काळ तो राजाश्रयाला राहिला. अलेक्झांडर सत्तावीस वर्षांचा असताना त्याच्या वडिलांचा खून एका अधिकाऱ्यानं केला.अशा राजनीतीचा उबग येऊन त्यानं राजदरबार सोडला.तो परत आपल्या गावी आला.राजाश्रयाला असताना त्यानं आपल्या जन्मगावावर फार उपकार केले होते.

युद्धात उद्ध्वस्त झालेलं ते गाव त्यानं राजाच्या साह्यानं परत वसविलं.देशोधडीला लागलेल्या तेथील नागरिकांना त्यानं पुन्हा बोलावून घेतलं.कित्येकांना गुलामगिरीतून मुक्त केलं.असा हा धर्मपुत्र परत आलेला पाहून सर्वांना आनंद झाला.त्यानं गावकऱ्यांच्या साहाय्यानं नवीन पाठशाळा स्थापन केली,

अ‍ॅरिस्टॉटलची ही पाठशाळा पुढे नावारूपाला आली.त्याच्या शाळेत विद्यार्जन करणं मोठ्या प्रतिष्ठेचं समजलं जाई,तो आपल्या विद्यार्थ्यांना पाठशाळेच्या पटांगणातून शिष्यगणासह चालत चालत शिकवीत असे.म्हणून त्याला पेरिपॅटेटिक म्हणून संबोधलं जाई.

तो नुसताच रूक्ष पंडित नव्हता.संसारी जीवनातही तो सुखी होता.त्याला दोन बायका होत्या.दोन मुलं होती. तो शानषोकीनं राही.उत्तम कपडे वापरी.बोटांत सोन्याच्या अंगठ्या घाली.पण त्याचा पिंड निसर्गात अधिक रमत असे.निसर्गात अनेक रहस्यं दडली आहेत.ती रहस्यं त्याच्या चिंतनाचा विषय होता.अशा गूढांचा शोध-बोध घेत भटकंती करावी,असं त्याला वाटे.पण निसर्ग-इतिहासाचा अभ्यास करणं,हे काही एकट्या-दुकट्या माणसाचं काम नाही.त्याला साधन-संपत्ती व राजाश्रय लागतो.या कार्यात त्याचा एके काळी विद्यार्थी असलेल्या सम्राट अ‍ॅलेक्झांडरनं साहाय्य केलं.त्याच्या दिमतीला विविध विषयांतील आठशे जाणकार त्यानं दिले.

राज्यातील शिकारी,पारधी आणि मासे मारणाऱ्या कोळ्यांना सूचना दिल्या की, वन्यजीवांविषयी शास्त्रीयदृष्ट्या काही माहिती मिळाल्यास त्यांनी ती अ‍ॅरिस्टॉटलला द्यावी.त्यानं निसर्गज्ञानाविषयीची शेकडो लक्षावधी हस्तलिखितं मिळवली नकाशे गोळा केले.वन्य जीवांचे नमुने प्रयासानं प्राप्त केले.आयुष्याच्या अखेरपर्यंत हे त्याचं कार्य चालू होतं.

अ‍ॅरिस्टॉटलनं विविध विषयांवर एकूण चारशे ग्रंथ लिहिले.बरेच ग्रंथ काळाच्या उदरात व युद्धाच्या खाईत नष्ट झाले.त्यांपैकी आता फक्त अठ्ठेचाळीस ग्रंथ उपलब्ध आहेत.याच काळात त्यानं भौतिक व आधिभौतिक शास्त्रावरील अलौकिक ग्रंथ प्रसिद्ध केले.ह्यामुळं सम्राटाची नाराजी झाली.

गुरूनं त्याला दिलेल्या अमूल्य ज्ञानाची तो स्वतःमध्ये जपणूक करीत होता.त्या ज्ञानाचा त्याला कोणी वाटेकरी नको होता.त्यानं आपल्या गुरूला पाठविलेल्या शेवटच्या पत्रात लिहिलं,"मला राजापेक्षा विद्वान होणं आवडलं असतं.माझा आनंद आपण हिरावून घेतला.माझी घोर निराशा झाली."

पण सम्राटाची रसिकता व दिलदारपणा आयुष्यात कधी कमी झाला नाही.म्हणूनच तो डायोनिअससारख्या निःसंग,विरक्त व ज्ञानी माणसाची जेवढी कदर करी, तेवढाच युद्धात शौर्य दाखविणाऱ्याचा गुणगौरव करी.राजरोष झाला तरी लोकांनी अ‍ॅरिस्टॉटलवर हात ठेवले नाहीत.त्यांच्यापुढं सॉक्रेटिसचं उदाहरण होतंच.

त्याचा 'हिस्टरी नॅचरॅलिस' हा ग्रंथराज अद्वितीय आहे.जग अ‍ॅरिस्टॉटलला प्राणिशास्त्राचा जनक म्हणूनच ओळखतं.ह्या अधिकारी व्यक्तीनं निसर्गाविषयी जे जे काही लिहिलं ते बहुमोलाचं आहे,परीक्षणापेक्षा शास्त्राला त्याच्यापासून सुरुवात होते.निसर्गाचा इतिहास लिहिण्यासाठी त्यानं अविश्रांत श्रम केले.त्याच्या सव्यसाची लेखणीनं स्पर्श केला नाही,असा कोणताही विषय नाही.परंतु या सर्वांत पक्षिशास्त्र हा त्याचा आवडता विषय होता.

पक्ष्यांचं वर्गीकरण त्यानं त्यांच्या बाह्य लक्षणांवरून केलं आहे.गरुड व घारीसारखे तीक्ष्ण नख्या असलेले तीन बोटांचे पक्षी,लावा,तितिर व रानकोंबड्यांसारखे साधी तीन बोटे असलेले,जमीन उकरणारे विष्किरी पक्षी आणि बोटं कातडीनं जोडलेले जलचर पक्षी असं त्यानं त्याचं वर्गीकरण केलं आहे.

ज्या पक्ष्यांना तीक्ष्ण नख्या असतात,त्यांच्या छातीचा भाग इतर पक्ष्यांपेक्षा अतिशय सशक्त असतो.त्यांच्या पायांना पुढं तीन व मागं एक बोट असतं.मानमोडी कुळातील पक्ष्यांच्या पायांना मात्र दोनच बोटं असतात. चोचीत जीभ व दातांचं स्थान आहे.नाक व कानासाठी छिद्रं असतात.त्यांचा उपयोग अनुक्रमे वास घेण्यासाठी व ऐकण्यासाठी होतो.डोळ्यांवरील पापण्यांना केस नसतात.ज्या पक्ष्यांना तीक्ष्ण नख्या नसतात त्यांना आर असते.

पाखरांच्या विणीविषयीच्या नोंदी मात्र अजूनही अबाधित आहेत.कोकिळा म्हणजे रूप बदललेला ससाणा नव्हे.दुसऱ्या पक्ष्यांची अंडी खाऊन त्यांच्या घरट्यात कोकिळा अंडी घालते आणि आपल्या पिलांचं संगोपन दुसऱ्या पक्ष्यांकडून करवून घेते.खंड्या, कस्तुरा, पंकोळी,बाज,श्येन व घुबड या पक्ष्यांच्या घरट्यांबाबत त्यानं मोठ्या विस्तारानं लिहिलं आहे.

पक्ष्यांच्या स्थलांतराविषयी त्यानं अत्यंत महत्त्वाच्या नोंदी केल्या आहेत.तो लिहितो,"क्रौंच रशियातील विस्तीर्ण पठारावरून नाईल नदीच्या उगमानजीकच्या दलदलीपर्यंत प्रवास करतात.पिवश्या ढोक,हंस, महाहंस पाणकोंबड्या व हरोळ्या पक्षी समशीतोष्ण प्रदेशात हिवाळाभर राहतात.पण शतकानुशतकं स्थलांतराविषयी चालत आलेल्या भ्रामक कल्पनांचं मूळ त्याच्याकडूनच आलं आहे.त्याचं म्हणणं असं की,काही पक्षी आपला काल हिमनिद्रेत घालवितात.या त्याच्या अनुमानाची पाळंमुळं इतकी खोल गेली होती की,डॉ.इलियट काऊससारख्या विद्वान अमेरिकन पक्षिशास्त्रज्ञानं आभोळीच्या हिमनिद्रेवर एकशेब्यांशी निबंध लिहिले. हिमनिद्रेत पक्षी वृक्षांची ढोली,गिरिपर्वतातील गुहा, कपारी व चिखलानं भरलेल्या दलदलीचा आश्रय घेतात. हा त्याचा सिद्धान्त केवळ आभोळी पक्ष्यापुरता मर्यादित नव्हता,तर महाबक व घारी इत्यादी पक्ष्यांचं आचरणही आभोळीप्रमाणंच असतं,असं त्याचं म्हणणं होतं.


पक्ष्यांच्या हिमनिद्रेविषयीच्या सिद्धान्ताचा प्रभाव

अ‍ॅरिस्टॉटलनंतर दोन हजार वर्षेपर्यंत पक्षिशास्त्रज्ञांवर होता.आभोळी पक्ष्यांचं हिवाळी निवासस्थान १९४४ साली त्यांच्या पायांतील कड्यांवरून शोधून काढण्यात आलं.परंतु आभोळीच्या हिवाळी स्थलांतराविषयीचं संपूर्ण गूढ अजूनही उकलता आलं नाही.

शब्दांचं धन,मारुती चितमपल्ली,छाया चितमपल्ली,प्रकाशक-मकरंद कुलकर्णी,साहित्य प्रसार केंद्र,सीताबर्डी,नागपूर

स्थलांतराच्या काळात पक्षी आपलं रूप बदलतात, असंही अ‍ॅरिस्टॉटलचं मत होतं.उत्तरेकडून काही पक्षी येताच दक्षिणेकडील पक्षी दक्षिण ध्रुवाकडे प्रयाण करतात.ऋतुमानातील बदलाप्रमाणं ते आपला पिसारा बदलतात.आता असं स्थलांतर करणारे पक्षी एकाच कुळातील असतात,असा शोध लागला आहे.

आकारानं मोठ्या पक्ष्यांचं स्थलांतर स्वीकारलं,तरी अगदी लहान लहान पक्षीदेखील स्थलांतर करतात,हे अ‍ॅरिस्टॉटलला मान्य नव्हतं,करकोचे व महाबक अशा मोठ्या पक्ष्यांच्या पाठीवर बसून लहान पक्षी प्रवास करतात.अशा प्रवासाच्या संधीची वाट पाहत छोटे पक्षी थव्याथव्यानं समुद्रकिनाऱ्यावर बसलेले आढळतात.असं त्यांन लिहून ठेवलं आहे.

¶¶¶ समाप्त ¶¶¶


4/7/26

संतुलन / balance

शांतता,समता,वाढ,सगळं असूनही महासमाज खऱ्या अर्थानं निरोगी नव्हता.तो आपल्या परिसरातल्या निसर्गाशी जुळून,

संतुलित झालेला नव्हता.त्याची प्रचंड, घनदाट प्रजा परिसराला झेपत नव्हती.बदल-मुंग्यांच्या क्षेत्रातल्या काही वनस्पती,काही प्राणी कमी व्हायला लागले.काही तर नष्टच झाले.


सर्वांत आधी संपल्या बदल-मुंग्यांसारख्या इतर मुंग्या; ओढा-वारुळ,पायवाट-वारूळ पद्धतीनं जगणाऱ्या. जितकी एखादी जीवजात बदल-मुंग्यांना जवळची, तितकी ती झपाट्यानं नष्ट झाली.बदल-मुंग्यांसारखंच अन्न खाणाऱ्या मुंग्यांची उपासमार व्हायला लागली. बदल-मुंग्यांच्या संख्येमुळे त्या अन्नावर आधी हात मारायच्या;आणि तसलंच अन्न खाणाऱ्यांना अन्न कमी मिळायचं.

त्यांच्या गस्ती मुंग्या,मावा किड्यांना दोहणाऱ्या मुंग्या यांची बदल-मुंग्यांशी भांडणं व्हायची.आणि संख्याबळामुळे नेहमी बदल-मुंग्याच जिंकायच्या.


नोकोबी परिसरातले मुंग्या खाणारे जीवही त्रासात होते.कोळी,

बीटल,भुंगे,हे मुंग्या खाणारे जीव आता मुंग्यांच्या संख्येमुळे स्वतःच भक्ष्य व्हायला लागले.त्यांची संख्या घटल्यानं बदल-मुंग्यांची संख्या अधिकच वेगानं वाढू लागली.


पूर्वी साध्या मुंग्या जे परिसर धोकादायक समजत असत,तिथे जायलाही बदल-मुंग्या तयार व्हायला लागल्या.त्यांची अनेक राणुकली,त्या राणुकल्यांची अंडी आणि अळ्या,साऱ्यांना भरपूर अन्न लागायचं.अन्न कमवायचं दडपण वाढल्यानं बदल-मुंग्या नको तिथे घुसखोरी करू लागल्या.एरवी मुंग्या पाण्याच्या फार जवळ जात नसत,कारण तो परिसर धोकादायक असायचा.

मुंग्या झाडांवर फार चढत नसत,कारण तिथे फारसं अन्न मिळायचं नाही.आता मात्र बदल-मुंग्या पाण्याजवळही जायला लागल्या,

आणि झाडांवरही. एरवी मुंग्यांपासनं सुरक्षित असलेले झाडांवरचे जीवही आता धोक्यात आले.सुरवंट,नाकतोडे,माश्यांच्या अळ्या, असे अनेक प्रकारचे कीटक आता अडचणीत आले. आणि आणखीनच महत्त्वाचं म्हणजे,वनस्पतीचं परागीकरण करणारे अनेक जीव घाबरून दुसरीकडे गेले.पाकोळ्या,

फुलपाखरं,गांधीलमाशा,मधमाशा, चतुर, भुंगे,अशा अनेक प्रकारांमधल्या अनेक प्रजाती दूर गेल्या.एकूण घुबड तलाव,नोकोबी परिसर जास्तजास्त एकसुरी होत गेला.

कीटकांमधली पूर्वीची विविधता रोडावली.


उरलं कोण? अत्यंत जाड कवचांचे भुंगे वाचले.गोमा वाचल्या.

काही प्रकारची गांडुळं वाचली.अनेक अगदी लहान,किंवा खूप वेगवान कोळी आणि कीटक वाचले. शहरांमध्ये चिमण्या,पारवे आणि उंदीर-घुशी टिकून राहतात तसा हा प्रकार.चवीला वाईट,किंवा पकडायला कठीण असे जीव शिल्लक राहिले.


काही जीवांना तर महासमाज,त्याचं साम्राज्य,हे सगळं आवडतही होतं.मावा किड्यांचे अनेक प्रकार, वनस्पतींना छिद्रं पाडून आणि त्यांचा रस शोषून मुंग्यांना आवडणारी विष्ठा टाकणारे जीव,यांना तर बदल-मुंग्यांनी पाळूनच ठेवलं! त्यांना मुंग्यांचं संरक्षण मिळालं.या जीवांमध्ये अंडी देणाऱ्या गांधीलमाश्या,त्यांना खाणारे लेडीबर्ड प्रकारचे भुंगे,यांना मुंग्यांनी हाकलून लावलं. माणसं जसं गाईगुरांना सांभाळतात,वाघ तरसांपासून संरक्षण देतात,तसे ही जीव बदल-मुंग्यांच्या संरक्षणात राहायला लागले.यानं वनस्पतींचं मात्र बरंच नुकसान व्हायला लागलं; कारण हे पाळीव जीव रस शोषणारे होते.


फारशी स्पर्धा उरली नसल्यानं बदल-मुंग्या संख्येनं वाढू लागल्या.

त्या जास्त क्षेत्रही व्यापत होत्या,आणि क्षेत्रातली मुंग्यांची दाटीही वाढत होती.पूर्वी जी मोठ्या क्षेत्रात विखुरलेली वारुळं असायची,

त्याऐवजी सर्व भाग एका वारुळाच्या सलग जंजाळानं व्यापला गेला होता. आणि वारुळं खादाड असतात.एखाद्या घनदाट वस्तीच्या महानगराला जसं बाहेरनं अन्न मिळणं आवश्यक असतं,तसं आता बदल-मुंग्यांच्या क्षेत्रात व्हायला लागलं.उन्हाळा उतरणीला लागला,आणि महासमाज अडखळू लागला.त्याचा परिसर,त्या परिसरातली एकमेकांना अन्न पुरवणारी जीवसृष्टी कोमेजायला लागली.अनेक वनस्पती त्यांचा रस शोषला गेल्यानं इतक्या दुबळ्या झाल्या,की त्यांना फळं-बिया घडवता येईनात.ससे,उंदीर,चिचंद्रया,खारी,बदल-मुंग्यांचं क्षेत्र टाळू लागले.सरडे,सापसुरळ्या दूर गेल्या. त्या कोणालाच महासमाजाच्या क्षेत्रात पुरेस अन्न मिळेना.जे काही अन्न होतं,ते खायला गेलं की ज्यादाच आक्रमक मुंग्या चावायच्या.या लहान जीवांवर जगणारे सापही तिकडे जाईनात.कारण त्यांना भक्ष्य मिळेना.अखेर माणसांचं लक्षही महासमाजाकडे गेलं.नोकोबीत पिकनिकसाठी जाणारे,घुबड तलावात मासे पकडायला जाणारे,सगळ्यांनाच बदल-मुंग्यांचा त्रास व्हायला लागला.

वारुळांनी लदबदलेल्या त्या क्षेत्राला सगळे जण टाळायला लागले.पूर्वी पायवाट वारूळ,ओढा वारूळ, असी तुरळक वारुळं लक्षातही येत नसत.आता माती उकरण्याच्या खुणा टाळणंच अशक्य झालं.पूर्वी लहान मुलंच वारुळांकडे लक्ष द्यायची.आता सगळे आश्चर्यानं साम्राज्याकडे पाहायचे.अखेर या प्रकाराबद्दलचं माणसांचं मत मांडलं गेलं,"काहीतरी नव्याच प्रकारच्या मुंग्या आहेत,आग्या मुंग्यांपेक्षाही त्रासदायक.छ्याः यांचा बंदोबस्त करायलाच हवा!"


महासमाजानं आपला परिसर कह्यात घेतला होता;शत्रू आणि स्पर्धकांवर मात केली होती;आपलं भौगोलिक क्षेत्र आणि अन्नक्षेत्र वाढवलं होतं;नवे ऊर्जास्रोत शोधले होते;आणि या सगळ्याचा परिणाम म्हणून मुंग्यांची पैदास विक्रमी पातळीवर नेऊन ठेवली होती.पण घुबड तलावाच्या किनाऱ्यावरची महासमाजाची पकड टिकाऊ नव्हती.परिसरशास्त्राच्या दीर्घ कालगणनेच्या मापांत महासमाज फार तर मूठभर वर्षे टिकणार होता.क्षेत्र वाढवतानाच त्याच्या बदल्यात महासमाजानं शाश्वतीचा बळी दिला होता.जो जीन-बदल यशाकडे नेणारा वाटला होता,तो खरं तर घोडचुकीसारखा होता !


'वारुळ पुराण',माधव गाडगीळ',ई.ओ.विल्सन,अनुवाद - नंदा खरे,मनोविकास प्रकाशन


परिसराचा ऱ्हास करणं,ही महासम्राज्याच्या स्थापनेसाठी,

वाढीसाठी दिलेली जबर किंमत होती. भरपूर ऊर्जा खात,अन्न खात असतानाच प्रत्येक जीव परिसराचंही काही देणं लागत असतो.

काही काळासाठी ही कर्जफेड थांबवता येते.आपलं क्षेत्र वाढवण्यानं कर्जफेड जराशी पुढे ढकलता येते.पण क्षेत्र मर्यादित असतं.ते फार वाढवत नेता येत नाही.कधी नवा अन्नस्रोत शोधूनही ऊर्जेची परतफेड पुढे ढकलता येते.पण यानंतरही प्रश्न सुटत नाहीत,कारण मग भविष्यात जास्तच ऊर्जा फेडावी लागते.


तर महासमाज लवकरच पेचात येणार,हे उघड होतं. सगळ्या जीवजाती आपापल्या परिसरात तारेवरची कसरत करत असतात.परिसरातून जेवढी ऊर्जा,जेवढं अन्न घेतो;तेवढं अन्न आणि तेवढी ऊर्जा परत करणं,ही तोल सांभाळायची एकुलती एक पद्धत आहे.तोल जाऊन कपाळमोक्ष होण्याच्या मात्र हजारो पद्धती आहेत.


निसर्ग याच तन्हेनं चालतो.उत्क्रांती याच मर्यादांमध्ये वावरते.

मुंग्यांना तगवून ठेवणारी वागणूक त्यांच्या मूलप्रवृत्तीमधून घडली होती.ह्या मूलप्रवृत्ती जीन्समुळे घडल्या होत्या.ही सगळी जीन्स मूलप्रवृत्ती-वागणूक रचना पूर्वी यशस्वी ठरली होती.इतिहासातल्या वेगवेगळ्या घटनांमुळे त्या रचनेचे भाग उद्भवले आणि टिकून राहिले होते.पण हे सगळं होऊन गेलं होतं.पुढे काय होईल यासाठी तयारीत राहणं,हे अशक्य होतं. तसं करणं,हे जीन्समुळे घडलेल्या वागणूक-रचनेचं कामच नव्हतं.एखादी नवी स्थिती उद्भवणं,एखाद्या जीन-बदलानं तात्पुरतं यश देणं,यातून फक्त पुढचं संकट जवळ येत असतं.सतत बदलत्या परिस्थितीत टिकून राहायला नेमकी शाश्वत वागणूक लागते आणि नशीब लागतं.महासमाज तारेवरून कोसळणार होता.या एका बाबतीत तो आसपासच्या मानवी वारुळासारखा होता. आणि महासमाज कोसळण्यात माणसं - मुंग्यांना चालती-हलती झाडं वाटणारी माणसं यांचा हात होता.


■■■ समाप्त ■■■

4/5/26

द्वेषमूर्ती हॅनिबॉल / Hateful Hannibal

हॅनिबॉल ही शपथ कधीही विसरला नाही.स्वतःच्या पित्यासमोर,स्वतःच्या देशाच्या देवासमोर केलेल्या प्रतिज्ञेचे विस्मरण होणे कसे शक्य आहे?

जवळजवळ पंचवीस वर्षे रोमन कार्थेजियन यांच्यांत शांतता नांदली;पण ख्रि.पू. २१८ मध्ये दोघांच्याही सहनशीलतेला जणू तडेच पडले ! दोघेही केलेल्या कराराला कागदाच्या कपट्याप्रमाणे मानू लागले. प्रत्येक जण दुसऱ्याच्या वर्चस्वाखाली प्रदेशावर आक्रमण करण्याची तयारी गुप्तपणे करू लागला. रोमन लोकांनी साम्राज्याची उभारणी सुरूच ठेवली होती.कोणता नवीन प्रदेश घेता येईल;नवीन वसाहती कोठे वसविता येतील,इकडे त्यांचे सारखे लक्ष असे.त्यांनी तांब्यांच्या खाणींनी समृद्ध असा
 सार्डिनिया आपल्या राज्याला जोडला.त्यांची सुसंघटित लुटारूपणाची आंतरराष्ट्रीय गुंडगिरी सारखी सुरूच होती.रोमनांनी सार्डिनिया घेताच कार्थेजियनांनी दक्षिण स्पेन बळकावून त्याचा वचपा काढला.दक्षिण स्पेनमध्ये चांदीच्या खाणी होत्या. कार्थेजियनांची ही धडाडी व त्यांचे हे साहस पाहून रोम लोक चकित झाले ! कार्थेजियनांना धडा शिकविला पाहिजे असे,त्यांनी ठरविले.

पण जर्मन ज्याप्रमाणे १९१४ साली शत्रूला तोडीस तोड होते;एवढेच नव्हे.पण कांकणभर सरसच होते. तद्वतच कार्थेजियनही होते.रोमन सैन्य गलबतांत बसून निघणार तोच हॅनिबॉलच्या नेतृत्वाखाली कार्येजियन फौजा आल्प्स पर्वत ओलांडून उत्तर इटालीमधून प्रचंड लोंढ्याप्रमाणे रोमवर चालून येत आहेत अशी बातमी आली.रोमन सीनेटरांनी ती बातमी शक्य तितकी गुप्त ठेऊन हॅनिबॉलशी मुकाबला करण्यासाठी फौजा पाठविल्या.हे दुसरे प्युनिक युद्ध,रोमनांनी हे युद्ध विजयाच्या आक्रमक इच्छेने सुरू केले होते.त्यांनी चढाईला सुरुवात केली; पण चढाई तर दूरच राहिली आणि त्यांच्यावरच उलट मातृभूमीच्या रक्षणार्थ बचावावी पवित्र लढाई करण्याची वेळ आली.'रोमन रिपब्लिकची सत्ता जगभर पसरवा,रोमन सत्तेचा धोका नष्ट व्हावा म्हणून प्राणार्पण करण्यास पुढे या,'अशी घोषणा केली गेली.रोमन सेना देशभक्तीने प्रेरित होऊन वेगाने निघाल्या.इटलिच्या उंबरठ्यापाशी हॅनिबॉलला थांबवावे म्हणून त्यांनी जोराने कूच केले.पण हॅनिबॉलने त्या सैन्याला ट्रॅसिमेनस सरोवराजवळ कोंडून नष्ट केले.

रोमन सीनेटर गर्भगळीत झाले.सक्तीची सैन्यभरती करून त्यांनी दुसरी सेना उभारली व कार्थेजियनांचा लोंढा थांबविण्यासाठी ती पाठविली.रोमपासून थोड्या मैलांवर कॅन्नी येथे उभय सेनांची गाठ पडली व रोमनांचा पुरा धुव्वा उडाला ! सैन्य व अंमलदार मिळून सत्तर हजार रोमन ठार झाले.

रोमन लोकांचा इतका मोठा पराभव क्वचितच झाला असेल.रोमवर ही प्रचंड आपत्ती होती.हा प्रखर प्रहार होता.हॅनिबॉल आज ना उद्या रोमवर चालून येणार हे नक्की होते.विजेच्या गोळ्याप्रमाणे तो कोणत्याही क्षणी कडाडत येईल असे पदोपदी वाटे.पण हॅनिबॉल चाल करून येईना तेव्हा सर्वांस आश्चर्य वाटले.तो रोम शहरांकडे पाठ फिरवून दक्षिण इटलीत निघून गेला.त्याच्या त्या विचित्र वर्तनाचे कारण त्या वेळी कोणाच्या ध्यानात आले नाही.पण ते उघड होते. पराभवामुळे झालेल्या रोमनांच्या नुकसनाइतकेच विजयी झालेल्या कार्येजियनांचेही नुकसान झाले होते.त्यांचे पुष्कळेसे सैन्य ठार झाले होते,त्यांची साधनसाम्रगी संपुष्टात आली होती.शक्ती क्षीण झाली होती.त्यांच्या विजयी आक्रमणाचा वेग अविश्रांतपणे सुरू होता,त्यांनी क्षणभरही दम घेतला नसल्यामुळे त्यांना विश्रांतीची जरुरी होती.रोमवर हल्ला करण्यासाठी त्यांना ताजा पुरवठाही हवा होता.नवी माणसे,नवी यंत्रे,नवी हत्यारे यांची त्यांना गरज होती.म्हणून कार्येजहून नवीन सैन्याचा व नवीन साधनसामग्रीचा पुरवठा होईपर्यंत वाट पाहण्याचे हनिबॉलने ठरविले.तोपर्यंत इटलीच्या प्रांतांतून कार्येजियनांचा प्रचार करीत तो हिंडणार होता.त्याने प्रचाराची स्वारी सुरू केली होती.

पण रोमनांनी नवेच डावपेच सुरू केल्यामुळे हॅनिबॉलच्या अडचणी वाढतच गेल्या.किंटस फेबियस मॅक्झिमस हा रोमन सैन्याचा सेनापती होता.त्याला त्याच्या देशबांधवांनी 'वेळ घेणारा दिरंगाई करणारा' (कॅक्टेटर - डिलेअर) अशी पदवी दिली होती.तो कधीही त्वरित निर्णय घेत नसे. निर्णय घेण्याचे काम तो नेहमी पुढे ढकली.ज्या लढाया आज खेळावयाला हव्यात,त्या उद्यावर ढकलणेच अधिक बरे असते,अशी त्याची ठाम समजूत होती.क्विटस फेबियस हॅनिबॉलशी लढाई देण्याची सारखी टाळाटाळ करीत होता.त्यामुळे लवकर सोक्षमोक्ष होईना.कार्थेजियन कंटाळू लागले. दिरंगाई व कालापव्यय यामुळे त्यांचे नीतिधैर्य गळाठले खचले.लढून पराजय होता तरी पत्करता, पण ही न लढण्याची लढाई नको,असे त्यांना होऊन गेले.ते शत्रूचा पाठलाग करू पाहत होते.पण शत्रू होता कोठे? ते छायामय शत्रूचा पाठलाग करीत होते. शत्रू सारखा झुकांड्या देत होता.तो जवळ दिसे,पण क्षणात दूर जाई.जिवंत शत्रूला कसे जिंकावे हे कार्येजियन जाणत होते.पण पोकळ हवेवर कसा विजय मिळवावा;
छायामय शत्रूला कसे पराभूत करावे,हे त्यांना समजेना.रोमन शस्त्रास्त्रे जेथे निस्तेज व हतप्रभ ठरली;पराभूत झाली,तिथेच क्विटस फेवियसचा हा निःशस्त्र प्रतिकार प्रभावी व विजयी होत होता.

हॅनिबॉल कार्थेजहून येणाऱ्या सैन्याची व वाहतुकीची वाट पाहात होता.आपण लवकरच मदतीस येतो, असा त्याचा भाऊ हस्द्रुबॉल याचा निरोप आला.नीट सुसज्ज असे प्रचंड सैन्यच नव्हे तर रोमला वेढा घालण्यासाठी जरूर ती यंत्रेही घेऊन हस्द्रुबॉल येणार होता..
हस्द्रुबॉल विजयी होत होत उत्तरेकडून आल्प्सच्या मागनि येत होता. 

त्याने स्पेनमधून रोमन शिबंदीचा फन्ना उडविला होता व तो आता इटलीत येणार होता ही विजयवार्ता कानी पडताच हॅनिबॉल आनंदाला व आपली आणि  हस्द्रुबॉलची गाठ कोठे पडाची हे त्याने ठरविले. दोघांची गाठ पडल्यावर दोघेही टायबर नदीच्या तीरावरील रोम शहरावर चालून जाणार होते.

हॅनिबॉल हस्द्रुबॉलची वाट पाहत असता हस्द्रुबॉलऐवजी रोमन लोकांनीच त्याला एक अभिनंदपर भेट पाठविली.हॅनिबॉल ती उघडून पाहू लागला,तो आत त्याला काय आढळले? त्याच्या भावाचे मुंडके ! रोमन लोकांनी हस्द्रुबॉलच्या
 अचानक हल्ला करून त्याला ठार केले होते.

भावाच्या मरणामुळे हॅनिबॉलच्या आशा धुळीस मिळाल्या,त्याचे मनोरथ ढासळले.इटलीत यापुढे एक क्षणही राहणे उपयोगी नव्हते;नव्हे ते मूर्खपणाचेच ठरले असते.हस्द्रुबॉलवर
मिळालेल्या विजयामुळे रोमनांनीही चढाई सुरू करून भूमध्यसमुद्रातून थोडे सैन्य खुद्द कार्थेजवर पाठविले.कार्थेज संकटात पडले.हॅनिबॉलला स्वतःच्या नगरीच्या रक्षणार्थ धावपळ करीत मागे फिरावे लागले.कितीतरी वर्षांनी तो स्वदेशात परत आला होता.तो भर तारुण्यात इटलीत गेला होता, त्या वेळी त्याच्या नसानसांत रोमनांचा द्वेष भरला असून त्याला तेव्हा विजयाबाबत खात्री होती.पण आता त्याच्या डोळ्यांवरची झापड उडाली होती;तो हताश होऊन वृद्धावस्थेत कार्थेजला परतला होता. त्याच्या मनातील द्वेषबीजाचेच आता निराशेच्या
हलाहलात रूपांतर झाले होते व ते त्याला सारखे जाळीत होते.त्याच्या देवांनी त्याची वंचना केली होती.आपला नक्की पराजय होणार हे जाणून तो लढत होता-गमावलेल्या गोष्टीसाठी लढत होता. तरीही तो डगमगला नाही.सैन्याचे अवशिष्ट जिर्णशीर्ण भाग घेऊन तो उभा राहिला.ख्रि.पू. २०२ मध्ये झामा येथे रोमनांची व त्याच्या सैन्याची गाठ पडली.कार्थेजिनयांचा पुरा मोड झाला. हॅनिबॉलने तहाची बोलणी सुरू केली.

हॅनिबॉल कार्थेजमध्ये काही दिवस सार्वजनिक खात्यांचा मंत्री म्हणून काम करीत होता.पण आपल्या अमर द्वेषाच्या शमनार्थ रोमवर पुन्हा जंगी स्वारी करण्याची तयारी तो गुप्तपणे करीत असल्याची कुणकुण कानी आल्यामुळे रोमनांनी साशंक होऊन कार्थेजकडे हॅनिबॉलला आपल्या ताब्यात देण्याची मागणी केली.आपल्या भावाचा क्रूरपणे करण्यात आलेला वध डोळ्यांसमोर असल्यामुळे हॅनिबॉल पण रोमन तिथेही त्याच्या पाठोपाठ आले.तो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी अशी सारखी धावपळ करीत होता व शत्रूही सारखे त्याचा पाठलाग करीत होते.शिकारी कुत्रे पाठीस लागावे,त्याप्रमाणे रोमन त्याचा पिच्छा सोडीनात.वन्य पशूची शिकार करणे हा तर रोमनांचा आवडता खेळ होता;पण पराभूत व भयभीत शत्रूची शिकार करणे हा त्यांचा त्याहूनही आवडता खेळ होता.शेवटी काळ्या समुद्राच्या तीरी बिथिनिया येथे तो पकडला गेला.निसटून जाणे अशक्य,असे वाटले तेव्हा आत्महत्या केली.'रोमनांची चिंता सरावी, त्यांना हायसे वाटावे म्हणून मी स्वतःच स्वतःला मारून घेतो',असे तो उपहासाने म्हणाला.

म्हाताऱ्या व अगतिक हॅनिबॉलचा सूडबुद्धीने असा सारखा पाठलाग करणे हे खरोखर गुन्हेगारीचे कृत्य होते.पण पुढे कार्थेज शहराचा जो जाणूनबुजून खून करण्यात यावयाचा होता त्या नीचतम व अती भयानक गुन्ह्याची ही केवळ नांदी होती,त्या घोरतम पापाची ही केवळ प्रस्तावना होती.

०३.०४.२०२६ या लेखातील शेवटचा भाग...!!

4/3/26

द्वेषमूर्ती हॅनिबॉल / Hateful Hannibal

कार्थेजियन राजपुत्र...!

ग्रीक व इतर आर्य युरोपच्या मध्यभागी कार्यक्षेत्रात उतरले असताना तिकडे फोनिशियन लोक फार अशांत व अस्वस्थ झाले होते.टायर शहरातील फोनिशियन स्त्री-पुरुष येथील परिस्थितीला कंटाळले होते.जरा सुरेख नवे घर मिळावे म्हणून त्यांची धडपड सुरू झाली; नवे घर शोधावयाला ते बाहेर पडले.गलबतांत बसून ते भूमध्य समुद्रातून पश्चिमेकडे निघाले.आफ्रिकेतल्या अगदी उत्तरेच्या एका लहान प्रदेशावर ते उतरले.तो टापू सुपीक होता.फोनिशियन तिथे वसाहत करू लागले. 

त्यांनी तेथील मूळच्या रहिवाशांची कत्तल केली. हे मानवी बळी देऊन त्यांनी आपल्या देवाची प्रार्थना केली व त्याचे आभार मानले.समुद्राभिमुख अशी नवी वसाहत उभी राहिली व हळूहळू वाढू लागली. लवकरच तिथे भव्य व भरभराटलेले कार्थेज नगर उभे राहिले.

कार्थेजियनांनी फोनिशियनांपासून दोन गोष्टी घेतल्या; व्यापारातील कौशल्य व नरमेघावरील विश्वास. आफ्रिकेच्या उत्तर किनाऱ्यांवर,तशीच फ्रान्सच्या दक्षिण भागात व स्पेनमध्येही त्यांनी कितीतरी व्यापारी ठाणी बसविली.भूमध्य समुद्राच्या अर्ध्या भागावर त्यांचे प्रभुत्व होते व उरलेल्या अर्ध्या भागावरही प्रभुत्व प्रस्थापित करण्यासाठी ते आपले आधाशी गिधाडी डोळे फिरवू लागले.यज्ञप्रिय मोलोको देवाची सदिच्छा प्राप्त व्हावी, त्याची कृपादृष्टी असावी व त्यामुळे व्यापारात व लष्करी साहसांत आपणास यश यावे म्हणून ते पुन्हापुन्हा नरमेध करून त्याला मानवी मांसाची मेजवानी देत,लाच देत. काही असो,काही होवो,

मोलोक्कोला त्याचा पोटभर वाटा नेहमी मिळे,कार्थेजियन लढाईत विजय मिळवून परतले तर युद्धकैद्यांतल्या अत्यंत सुंदर कैद्याचा नैवेद्य ते भीषण मोलोक्को देवाला अर्पण करीत व पराभूत होऊन परत आले,तर आपल्यातल्याच मोठमोठ्या घराण्यांतील मुलेबाळे होळीत फेकीत.जय-पराजय काहीही झाले,तरी मोलोक्को देवाची चैनच होती.

राज्यासाठी आपल्या मुलाबाळांचे बळी देण्याची पद्धत आजतागायत सर्वत्र सुरूच आहे.कार्थेजियन जरी आपल्या मुलाबाळांना बळी देत,तरी एकंदरीत ते सुसंस्कृतच होते.त्यांची संस्कृती उच्च दर्जाची होती व म्हणून ज्या ज्या देशांशी ते व्यापार करीत,त्या सर्व देशांकडे ते तुच्छतेने बघत.विशेषतः रोमन लोकांच्या रानवट चालीरीती पाहून तर त्यांना गंमतच वाटे.हे आडदांड व रांगडे रोमन इटलीच्या पश्चिम किनाऱ्यावर भूमध्यसमुद्राच्या पलीकडे राहत.कार्थेजमध्येही येऊन काही रोमनांनी दुकाने वगैरे घेतली.ते रस्त्यामध्येच दुकाने मांडून बसत.त्यांची वागण्याची पद्धत खेडवळ होती व त्यांची शरीरे बुटकी होती.पण त्यांचा रुबाब मात्र मोठा होता.त्यांची ती शिष्टपणाने वागण्याची पद्धत व सुसंस्कृत भाषा पाहिल्यावर दोहोंतील विरोध चांगलाच डोळ्यांत भरे.कार्थेजमध्ये रोमची पुढीलप्रमाणे टिंगलटवाळी करण्यात येत असे;संबंध रोमन शहरात चांदीचे ताट एकच आहे व कोणा सीनेटरला कोणास मेजवानी द्यावयाची असली म्हणजे त्याला ते ताट उसने आणावे लागते.!

पण रोमन लोकांत सभ्यता,संस्कृती किंवा श्रीमंती नसली तरी ते महत्त्वाकांक्षी लढवय्ये होते.ज्या वेळी आर्य लोक उत्तरेकडून आल्प्स पर्वत ओलांडून खाली आले,त्या वेळेस त्यांच्यापैकी येथे राहिलेल्या आर्य लोकांचे वंशज ते हे इटालियन हे इटालियन लोक जेव्हा त्या पायाच्या आकाराच्या भूभागात गेले,तेव्हा त्यांना तिथे आधीच येऊन राहिलेल्या दोन जाती आढळल्या. 

रानटी आयबेरियन व सुसंस्कृत युट्रस्कन तिथे होते. इटालियनांनी आयब्रेरियनांचा निःपात केला,युट्रस्कन लोकांपासून ते रस्ते बांधणे,शिल्पकाम,वैद्यकी,औषधे, ज्योतिषशास्त्र इत्यादी नाना गोष्टी शिकले,व मग त्यांनी आयबेरियनांप्रमाणे त्यांचाही निःपात केला, त्यांचेही उच्चाटन केले.हे इटालियन सारे एकजुटीने लढत नव्हते.त्यांचे निरनिराळे संघ होते.ते एकमेकांपासून पृथक् राहून सर्वत्र लूटमार करीत व सर्व देशाला सळो की पळो करून सोडीत.त्यांच्या जथ्यापैकी एक जथा तर फारच रानवट होता.पळून गेलेले गुलाम,अती शूद्र लोक व ठिकठिकाणचे परित्यक्त व बहिष्कृत लोक अशांचा तो जथ्था होता.त्यांनी टायबर नदीच्या मुखाजवळचा डोंगराळ प्रदेश जिंकून घेतला,त्याची तटबंदी केली व जे जे गुलाम पळून येत,चोर दरोडेखोर न्याय चुकविण्यासाठी आधार शोधीत जात,त्या सर्वांना तिथे आश्रय देण्यास सुरुवात केली.अशा रीतीने रोम शहर स्थापले गेले.

प्रथम त्यांच्या या वसाहतीत बायका नव्हत्या.पण ज्या ज्या गोष्टीची जरुरी भासेल ती ती गोष्ट मिळवून घ्यावयाचीच असा रोमन लोकांचा बाणा होता.जवळच्या सबाइन लोकांवर ते तुटून पडले व त्यांच्या बायकांपैकी अत्यंत सुंदर व घट्ट्याकट्ट्या बायकांना घेऊन गेले.त्या बायकाही जावयाला फारशा नाखूश होत्या असे नाही.विजयी रोमनांच्या बायका होण्यास त्या तयारच होत्या.या आपल्या नव्या बायकांच्या मदतीने त्यांनी सबाइन लोकांशी मैत्री केली व नंतर सारे इटालियन द्वीपकल्प पादाक्रांत करण्यासाठी ते निघाले.

त्यांची प्रगती फार झपाट्याने झाली नाही;पण जिथे ते पाय रोवीत तिथे ते तो भक्कम करीत.त्यांचे लष्करी तंत्र हळूहळू व पण निश्चितपणे शत्रूस चिरडून टाकी व शरण यावयास लावी.रोम शहराभोवतालची शंभर मैल घेराची जागा जिंकून घ्यावयास त्यांना तीनशे वर्षे लागली.पण एकदा तो प्रदेश जिंकून इटली ताब्यात घेतल्यावर इटलीत कोणीही त्यांच्याविरुद्ध डोके वर काढू शकला नाही.शस्त्रांनी लढून ते जो जो नवीन प्रदेश मिळवीत,तिथे तिथे लगेच रोमन वसाहत स्थापीत. अशा रीतीने रोमला अनुकूल अशा लोकांचे संबंध सर्वत्र पसरून सर्व इटली देश त्यांनी आपल्या ताब्यात ठेवला.

पण या बाहेरच्या विजयी मुलूखगिरीस घरच्या भांडणांमुळे अधूनमधून अडथळा येई.रोमन लोकांसारखे आपसात भांडणारे लोक जगाच्या इतिहासात दुसरे क्वचितच दिसून येतील.त्यांनी प्रथम युट्रस्कन लोकांतील राजांचे शासन मान्य केले;पण हळूहळू त्यांना या राजांचा वीट आला व त्यांनी निराळी शासनपद्धती सुरू केली.दरसाल दोन पालनकर्ते निवडले जात. प्रतिष्ठित नागरिकांचे एक पार्लमेंट असे.हे दोन पालनकर्ते या पार्लमेंटमधील प्रतिनिधींच्या सल्ल्याने राज्यकारभार चालवीत.या प्रतिष्ठित प्रतिनीधींना 'पॅट्रिशियन' म्हणत.ज्या गुलामांनी व दरोडेखोरांनी रोम स्थापिले.

त्यांच्या वंशजांना 'पॅट्रिशियन' किंवा 'वरच्या वर्गाचे लोक' म्हणण्यात येई.हे इतर लोकांचे जणू मायबापच ! जे गरीब व दरिद्री लोक असत,त्यांना 'प्लीबियन' म्हणण्यात येत असे.वरिष्ठ वर्गाच्या अहंमन्यतेमुळे व दुष्टतेमुळे हे सामान्य लोक शेवटी बंड करून उठले. त्यांनी सार्वत्रिक संप पुकारला.ते जवळच्या एका टेकडीवर गेले व तिथे प्रतिस्पर्धी असे दुसरे शहर उभारण्याची त्यांनी धमकी दिली.रोमच्या दरवाज्याजवळच असा एक प्रबळ शत्रू उत्पन्न झाला म्हणून प्रतिष्ठित पॅट्रिशियनांना भीती वाटली.त्यांनी प्लीबियनांना बोलावून त्यांनाही राज्यकारभारात भाग देण्याचे कबूल केले.तेव्हापासून हे सामान्य लोकही आपले प्रतिनिधी पाठवू लागले.बहुजन समाजाच्या या प्रतिनिधींना 'ट्रायब्यून्यस' म्हणत.अमुक एक कायदा आपल्या मतदारांच्या हिताविरुद्ध आहे असे वाटले, तर ते तो कायदा नामंजूर करू शकत.

जरी या तडजोडीमुळे रोमन लोकांची आपसांतील भांडणे तात्पुरती मिटली तरी भांडणांचे व द्वेष-मत्सरांचे वणवे पुन्हापुन्हा पेटतच,असंतुष्ट लोकांची दुःखे,अती महत्त्वाकांक्षी लोकांच्या परस्परविरोधी महत्त्वाकांक्षा वगैरेंमुळे रोम शहर म्हणजे जणू खाटिकखानाच बने ! पण दरवाज्याच्या आत जरी ते आपसांत लढत असले, तरी बाहेर मात्र ते रोमची सत्ता वाढवीतच राहिले.

टायबर नदीच्या उत्तरेकडील जाती-जमाती रोमनांच्या ताब्यात प्रथम आल्या नंतर दक्षिणेकडील मॅग्ना ग्रीशीयात वसाहत केलेल्या लोकांस रोमनांच्या पोलादी मुठीचे बक्षीस मिळाले.या वसाहती ग्रीकांनी वसविल्या होत्या,हे मॅग्नागिशीया या नावावरूनच दिसून येत आहे. रोमनांनी त्यांना शस्त्रास्त्रांनी जिंकले तर उलट ग्रीकांनी त्यांना आपल्या लष्करी जेत्यांना स्वतःच्या उच्च संस्कृतीने जिंकले.रोमनांनी ग्रीकांचे संगीत घेतले;त्यांचे काव्य उचलेले;त्यांचे तत्त्वज्ञान,त्यांच्या देवदेवता सारे घेतले;त्याचा त्यांना नीट उपयोग मात्र करून घेता आला नाही. हसणारे-खेळणारे थोर ग्रीक आदर्श घेऊन त्यांनी उग्र व भीषण चेहऱ्याचे व नेहमी खिन्न आणि रुष्ट असणारे प्रकार बनविले.रोमन लोक जेव्हा ग्रीकांचे अनुकरण करीत,तेव्हा एखादा हत्ती एखाद्या सुंदर नृत्यकुशलाचे अनुकरण करीत आहे असे वाटे.

पण झगड्यांवाचून मात्र ग्रीक वसाहती रोमनांना शरण गेल्या नाहीत.ग्रीकांनी एपिरसचा राजा पिन्हास मदतीस बोलाविले.एपिरस देश म्हणजे अलेक्झांडरच्या आईचे माहेर.राजा पिन्हास याला आपण दुसरे अलेक्झांडर होणार असे वाटे. आपण रोमन लोकांचा तेव्हाच धुव्वा उडवून देऊ,अशी त्याची कल्पना होती.रोमन लोकांची चटणी उडवून पुढे कार्थेजिनयनांसही जिंकावे व सारे जग जिंकून घेण्यास अशा रीतीने आरंभ करावा असे विचार त्याच्या मनात आले.

पिन्हासच्या स्वारीचा धोका समोर असल्यामुळे रोमनांनी व कार्थेजियनांनी एक होऊन परस्पर संरक्षक करार केला,रोम व कार्थेज ही दोन्ही समोरासमोरची शहरे भूमध्य समुद्रावरून परस्परांकडे मत्सराने पाहत असत. त्यांना एकमेकांचे वैषम्य वाटे.आफ्रिकेच्या खाद्यांवर बसलेले वैभवोन्मत कार्थेज शहर साऱ्या जगाचे आव्हान स्वीकारावयास तयार होते,इटली ताब्यात घेणारे रोमही स्वतःच्या महत्त्वाकांक्षांचे क्षितिज वाढवू लागले होते.या दोघांच्या दरम्यान समृद्ध व संपन्न सिसिली बेट होते. दोघांच्याही बुभुक्षित जिभांना सिसिली पाहून पाणी सुटत होते.सिसिलीचा कब्जा कोणी घ्यावयाचा या प्रश्नावर आज ना उद्या त्यांची जुंपणारच होती.पण पिन्हासने जेव्हा मॅग्ना ग्रीशियावर स्वारी केली,तेव्हा परस्पर स्पर्धाळू रोमन व कार्थेजियन लोक आपसातील भांडणे तात्पुरती विसरून समान शत्रूशी लढवण्यासाठी एक होऊन एका झेंड्याखाली जमले.त्यांनी आपसांतील मतभेद पुढे मिटवावयाचे असे ठरविले.

फारशी अडचण न पडताच रोमला पिन्हासवर विजय मिळाला व नंतर रोमने कार्थेजकडे नजर वळविली.

रोम व कार्थेज यांमधील पहिले युद्ध तेवीस वर्षे (ख्रि.पू. २६४ ते खि. पू. २४१) टिकले.'पहिले प्यूनिक फोनेशियन युद्ध' या नावाने ते प्रसिद्ध आहे.ते मुख्यतः आरमारी युद्ध होते. 

मानवजातीची कथा,हेन्री थॉमस,अनुवाद - साने गुरुजी, मधुश्री पब्लिकेशन

सुरुवातीला कार्थेजियन अधिक हुशार खलाशी ठरले. पण युद्धाच्या हालचाली करण्यात रोमन लोक फार पटाईत होते.युद्धातील गोष्टी ते झट्कन शिकत.प्रथम प्रथम त्यांचे आरमारी पराजित झाले,पण त्या पराजयांतून ते विजयाचे पेचप्रसंग शिकले.आरमारी लढाया कशा जिकाव्यात हे शिकून शेवटी आरमारी लढायात त्यांनी आपल्या गुरूंचा पराभव केला. रोमनांनी सिसिली जिंकली.तह होऊन एकमेंकाच्या वर्चस्वाखालचे प्रदेश नक्की झाले व परस्परांचा अडथळा न होता दोघांनाही लुटालूट करण्यास भरपूर वाव मिळावा,अशी व्यवस्था त्यांनी करून टाकली,पहिल्या प्यूनिक युद्धातील कार्थेजियनांचा पुढारी हमिल्कर बार्का हा होता.

रोमनांनी पराजय केल्यावर पाच वर्षांनंतरची गोष्ट.हमिल्कर नऊ वर्षांच्या मुलाला घेऊन एके दिवशी रात्री बालच्या मंदिरात गेला व मोलोक्कोच्या मूर्तीपुढे त्याने त्याला "मी मरेपर्यंत रोमनांचा द्वेष करीन" अशी शपथ घ्यावयास लावली. मानवी यज्ञाहुती मिळण्यात मोलोक्को देवाला फार आनंद वाटत असे.

★★★ अपुर्ण,राहिलेला भाग पुढील लेखात…