* विजय गायकवाड | Vijay Gaikawad

live

नमस्कार आपले स्वागत आहे. मी पुस्तके आणि मित्रांवर पैसे खर्च करतो,माझ्याकडे दगड आणि विटांवर खर्च करण्यासाठी पैसे नाहीत.- रस्किन बाँड.ही थोर माणसं व त्यांचे विचार मला पुस्तकात भेटलीत.ती भेटली आणि त्यांनी सांगितले कि, प्रत्येक दिवशी असं काही तरी करा की,ते तुम्हाला अधिक सुंदर उद्याच्या दिशेने खूप लांबवर घेऊन जाईल."- डोग फायरबाऊ.' सर्वियन कादंबरीकार मिलोराद पावीच यांचे एक वाक्य आहे ते म्हणतात - जोवर जगात पुस्तक वाचणाऱ्या वाचकांची संख्या बंदूकधारी सैनिका पेक्षा अधिक आहे तोवर काळजीच काहीच कारण नाही.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात.पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये.म्हणून अविरतपणे प्रयत्न करणारे मार्गदर्शक, मित्र धावून येतात.प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,डॉ.दीपक शेटे,आ.भरत बुटाले,प्रा.सर्जेराव राऊत,सुभाष ढगे,अनिल फारणे,डॉ.सुधीर सरवदे ,विश्वास खाडे, विनायक पाटील,संजय कुंभार,सतीश खाडे,मनोहर सुर्वे,गणेश खंदारे,तात्या गाडेकर, दादासाहेब गाडेकर, दादासाहेब ताजणे, पुस्तकातील घटना प्रसंग सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील यांनी केलेले आहे. मला लिहिण्याची प्रेरणा देणारी पुस्तके,लेखक,प्रकाशक,मित्र ही जगावेगळी माणसं माझ्या जीवनातील महत्वाचा टप्पा आहेत.... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ.मेघा गायकवाड, चिरंजीव मयान,माझ्या धावण्यातील गुरुवर्य नामदेव बरुरे,लुल्ला शेख मोठी ताई ,लहान ताई जयश्री शिंदे या सर्वांचेच मनापासून आभार व धन्यवाद मॅट्रिक फेल विजय गायकवाड

१४/२/२६

शून्य गुण,पूर्ण विद्यार्थी : Zero marks,perfect student 

नरसंहाराची साक्षीदार / Witness to the genocide या लेखमालेतील तिसरा भाग हा १५.०२.२६ रोजी प्रकाशित होईल.१३.०२.२६ या दिवशी एक तातडीचा,जिव्हाळ्याचा लेख प्रकाशित करीत आहे.- विजय गायकवाड


https://www.vijaygaikwad.com हा जगातील वाचकांनी भरभरून लोकप्रिय केलेला ब्लॉग,२० देशांमध्ये,२४९ भाषांमध्ये,वाचला जाणारा.. या ब्लॉगवर व्यक्तीने भेट दिली आणि त्यांना काही महत्वाचं काही गवसलं नाही असं कधीच होत नाही.हेच ते या ब्लॉगचे एकमेव वैशिष्ट्य..याच ठिकाणी उजव्या बाजूला Popular Posts हा विभाग आहे.या विभागामध्ये तेच लेख असतात.जे वारंवार जास्तीत जास्त प्रमाणात जास्त देशांमध्ये वाचले जातात.सध्या या ब्लॉगवर ६३२ लेख तर हा लेख प्रकाशित होईपर्यंत वाचकांनी भेट दिलेली संख्या ६८ हजार.।।


सध्या Popular Posts या विभागात …!!


१.अभ्यासाचे महत्त्व /Importance of study


https://www.vijaygaikawad.com/2024/10/importance-of-study.html?m=1


२.विज्ञान संप्रेषण व जागरूकता science communication and awareness


https://www.vijaygaikawad.com/2025/09/science-communication-and-awareness.html?m=1


३.मानवी संस्कार /Human rites


https://www.vijaygaikawad.com/2024/11/human-rites.html?m=1


हे तिन्हीही लेख लिहिले आहेत.आमचे लाडके मित्र डॉ.दीपक शेटे यांनी तर ह्या व्यक्तीला भेटलं की ब्रायन ट्रेसी यांचे तत्वज्ञान समोर येते.


यश म्हणजे स्वातंत्र्य,स्वतंत्र असणं हा जीवनातील सगळ्यात मोठा आनंद आहे.आपल्या मनात जे येईल ते करायला आपण मुक्त आहोत असं वाटणं म्हणजे स्वातंत्र्य..! हे तत्त्वज्ञान मला त्यांच्या पहिल्या भेटीत गवसले.त्यांची माझी भेट ही अजुनही माझ्यासाठी ताजीच आहे.


मी पाहिलेला भला माणूस....?


खरोखरच आपण भला माणूस पाहू शकतो का? तर याचे उत्तर आहे हो.. भली माणसं पुस्तकात जागोजागी दिसतात. आपण त्यांना वाचत वाचत मोठे होतो. पण आपण काही भला माणूस होत नाही.नुसतचं वाचण्याचा हा दिर्घ परिणाम..

आपण आता वाचतोय डॉ.दीपक शेटे यांचा चौथा लेख..!


शून्य गुण,पूर्ण विद्यार्थी : Zero marks,perfect student - मूल्यांकन व्यवस्थेचा पुनर्विचार


रशियाच्या शिक्षण पद्धतीत परीक्षेचा कमाल गुण ५ असतो. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे—एखाद्या विद्यार्थ्याने उत्तरपत्रिका पूर्णपणे कोरी दिली तरी त्याला २ गुण दिले जातात.मॉस्को विद्यापीठात शिकायला गेलो त्या पहिल्याच दिवशी हे कळल्यावर मी अक्षरशः चकित झालो. मला ते अजिबात तर्कसंगत वाटले नाही.कोणी काहीही लिहिले नाही, तर त्याला शून्यच मिळायला नको का?


कुतूहलापोटी मी माझे प्राध्यापक डॉ. थिओडोर मेद्रायेव यांना विचारले,


"सर, एखादा विद्यार्थी काहीही लिहित नाही, तरी त्याला २ गुण देणे कसे योग्य आहे?"


डॉ. मेद्रायेव हसले. शांत आणि विचारपूर्वक आवाजात ते म्हणाले,


"शून्य म्हणजे अस्तित्वच नसणे. एखादी व्यक्ती प्रयत्न करत असताना ती शून्य कशी असू शकते? जरा विचार कर ...


 हा लेख सोशल मीडियावर वाचण्यात आला मग वाटलं आपण याच्यावर चिंतन करावं आणि लिहावं..


शिक्षणव्यवस्थेत गुण हा शब्द अत्यंत प्रभावी आहे.

तो केवळ विद्यार्थ्याच्या उत्तरपत्रिकेवर उमटणारा आकडा नसून,अनेकदा तो विद्यार्थ्याच्या आत्मविश्वासावर,

शिकण्याच्या प्रवृत्तीवर आणि भविष्यातील वाटचालीवर खोल परिणाम करणारा घटक ठरतो. म्हणूनच "रिकाम्या उत्तरपत्रिकेला शून्य गुण द्यावेत की किमान गुण?" हा प्रश्न तांत्रिक नसून मूल्याधिष्ठित आहे.


आजची मूल्यांकन व्यवस्था प्रामुख्याने उत्पादन-केंद्रित (product-oriented) आहे. विद्यार्थी काय लिहितो, किती अचूक लिहितो, हे मोजले जाते; पण तो शिकण्याच्या प्रक्रियेत कुठे आहे, त्याने किती प्रयत्न केले, त्याला कोणत्या अडचणी आहेत—याकडे दुर्लक्ष होते. परिणामी गुण म्हणजे न्याय नसून, अनेकदा निवड आणि नाकारण्याचे साधन बनते.


शून्य गुण : अपयश की अस्तित्व नाकारणे?गणितात शून्य ही एक आवश्यक संकल्पना आहे.पण शिक्षणात शून्य गुण देताना त्याचा अर्थ केवळ "उत्तर अयोग्य" एवढाच राहत नाही. 


तो विद्यार्थ्यापर्यंत पोहोचणारा संदेश असा असतो— "तू काहीच केले नाहीस. तुझी किंमत शून्य आहे."


मानसशास्त्रीयदृष्ट्या हा संदेश धोकादायक आहे.अनेक विद्यार्थी शून्य गुणांना अपयश म्हणून नाही, तर स्वतःच्या क्षमतेवरील अंतिम शिक्का म्हणून स्वीकारतात. अशा वेळी शिकण्याची जिज्ञासा कमी होते, आत्मविश्वास ढासळतो आणि काही विद्यार्थ्यांसाठी शिक्षणापासून दुराव्याची प्रक्रिया सुरू होते.


शिक्षणाचा उद्देश जर विद्यार्थ्यांना पुढे नेण्याचा असेल, तर शून्य गुण हा पूर्णविराम ठरतो—जिथे प्रत्यक्षात अल्पविराम अपेक्षित असतो.


किमान गुण देणे : सवलत नव्हे, मान्यता रिकाम्या उत्तरपत्रिकेला किमान गुण देण्याच्या कल्पनेविषयी एक गैरसमज आहे—


की यामुळे निकष सैल होतील, विद्यार्थ्यांमध्ये आळस वाढेल आणि गुणवत्तेवर परिणाम होईल.

खरं तर किमान गुण देणे म्हणजे यश देणे नाही.

ते म्हणजे एवढी मान्यता देणे की—


"तू या प्रक्रियेचा भाग आहेस. तू प्रयत्नाच्या प्रवासात आहेस."


विद्यार्थी परीक्षा केंद्रात पोहोचतो, उत्तरपत्रिका स्वीकारतो, प्रश्न वाचतो—हे सर्व प्रयत्नच आहेत. उत्तर लिहिता न आल्यामुळे त्याचे मूल्यमापन ज्ञानाच्या अभावावर व्हावे, पण मानवी अस्तित्व नाकारून नव्हे.


किमान गुण ही दयाळूपणाची कृती नसून,

ती शिकण्याच्या प्रक्रियेचा सन्मान करणारी भूमिका आहे.


भारतीय शिक्षणव्यवस्थेत हा प्रश्न अधिक तीव्र का आहे?


भारतात परीक्षा केवळ शैक्षणिक मूल्यांकन नसून, ती सामाजिक आणि कौटुंबिक अपेक्षांशी जोडलेली आहे. गुणांवरच प्रवेश, संधी, प्रतिष्ठा आणि आत्ममूल्यांकन ठरते. अशा परिस्थितीत शून्य गुण हा केवळ आकडा राहत नाही—तो दबाव, न्यूनगंड आणि भीती निर्माण करणारा घटक ठरतो.


म्हणूनच भारतासाठी परदेशी मूल्यांकन पद्धतीची तशीच्या तशी अंमलबजावणी योग्य नाही. मात्र, त्या पद्धतीमागील मानवी दृष्टिकोन स्वीकारणे अत्यावश्यक आहे.


आकड्यांपलीकडे जाणारे मूल्यांकन : गरज आणि दिशा,भारतीय शिक्षणव्यवस्थेसाठी योग्य मार्ग असा असू शकतो—


अंतिम परीक्षेपेक्षा सतत व सर्वांगीण मूल्यमापन

प्रयत्न, सातत्य आणि सहभाग यांना महत्त्व शून्य गुणांऐवजी Feedback-based remarks अपयशानंतर पुनर्प्रयत्न आणि सुधारण्याच्या संधी अशा पद्धतीमुळे गुणवत्ता कमी होत नाही; उलट विद्यार्थ्यांमध्ये शिकण्याची जबाबदारी आणि आत्मविश्वास वाढतो.


निष्कर्ष..!!


खरा प्रश्न हा नाही की— रिकाम्या उत्तरपत्रिकेला किती गुण द्यावेत?

खरा प्रश्न हा आहे—

अपयशाच्या क्षणी आपण विद्यार्थ्याला पुढे जाण्याची दिशा देतो का?

जोपर्यंत एखादी व्यक्ती प्रयत्न करत आहे,

तोपर्यंत तिला संपूर्ण नकार नव्हे,

किमान मान्यता मिळायलाच हवी.

कारण— शिक्षण हे आकड्यांसाठी नसते.

ते माणसासाठी असते.

आणि माणूस—

तो कधीच शून्य नसतो.


-डॉ.दिपक शेटे ( गणितायन लॅब  निर्माते )

गणित शिक्षक आदर्श विद्यानिकेतन अँड ज्युनिअर कॉलेज मिणचे.


दादा सप्रेम नमस्कार,अभ्यासाचे महत्त्व हा आपला लेख लाखो विद्यार्थ्यांच्या जीवनात नव संजीवनी आणल्याशिवाय राहणार नाही.असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे संत तुकारामांच्या या काव्यपंक्तीचा परामर्श विस्ताराने आपण या लेखातून केला आहे. येणाऱ्या शेकडो पिढ्यांना हा अभ्यासाचा सुकर मार्ग दाखवणारा मैलाचा दगड ठरेल.


विनम्र,

सुभाष बाबाराव ढगे | subhashdhage1110@gmail.com

टीप: हे ईमेल https://www.vijaygaikawad.com वरील संपर्क फॉर्म गॅझेट मार्गे पाठवलेले आहे.


शिक्षण संदेश…


शिक्षणाचा एक अर्थ दर्शनाचा होतो.डॉ. दीपक शेटे यांना भेटल्यानंतर तो जाणवतो.त्यांनी ज्या पद्धतीने वरती विवेचन केलेले आहे,ते विचार करायला लावणारे आहे.या अनुषंगाने एक नोंद या ठिकाणी देत आहे.


गो.ना. मुनघाटे गुरुजींचे आत्मचरित्र ' माझी काटेमुंढरीची शाळा ' या पुस्तकाची हेरंब कुलकर्णी यांनी लिहिलेली प्रस्तावना वाचत असताना एक अतिशय सुंदर वाक्य वाचनात आले आणि एकदम थाडकन उडालोच. या वाक्याच्या भोवती बराच वेळ घुटमळलो.स्वतःच्या कर्तव्याची आणि पार पाडत असलेल्या जबाबदारीची जाणीव या वाक्याने करून दिले.आपण आपलं कर्तव्य पाडताना काय करायला पाहिजे ज्यामुळे आपलं कार्य अधिक प्रसन्न,चांगले आणि ज्यांच्यासाठी करतोय ते अधिक हितकारक होईल यावर विचार करायला भाग पाडणारे हे वाक्य...


  • आपल्या विद्यार्थ्यांवरचे निरतिशय प्रेम एवढी शिक्षक होण्याची एकमेव पूर्वअट आहे.जे. कृष्णमूर्तीना एक विद्यार्थी विचारतो की, 'आम्हांला खेळण्यात जितका आनंद वाटतो, तितका अभ्यासात का वाटत नाही ?' कृष्णमूर्ती म्हणतात 'तुझ्या शिक्षकांना शिकवण्यात आनंद वाटत नाही म्हणून तुम्हांला शिकण्यात आनंद मिळत नाही.' ते पुढे म्हणतात, 'एखादी गायिका बैठकीवर गाणे. म्हणण्यापूर्वी हजारो तास रियाज करते. गाणे तिच्या श्वासात आलेले असते. त्यामुळेच ती जेव्हा गायला बसते तेव्हा श्रोते ते गाणे कित्येक वर्षे गुणगुणत राहतात. असे तुझे शिक्षक जेव्हा शिकवण्यावर प्रेम करतील तेव्हा बाळा, शिक्षण हे तुझ्यासाठी खेळण्याइतकेच आनंदी झालेले असेल...!!

१२/२/२६

नरसंहाराची साक्षीदार / Witness to the genocide

१०.०२.२०२६ या लेखातील दुसरा भाग पुढे सुरू..!!


त्यानंतर जवळपास धावतच हे दोघं पाद्रींच्या घरी जाऊन पोहोचतात.गावातले अनेक हुतू नागरिक तिथे जमा झालेले असतात.पण त्या ओळखीच्या लोकांमध्ये आल्यावर सुरक्षित वाटण्याऐवजी त्यांच्या तिरस्काराने भरलेल्या नजरा पाहून इमॅक्युली समजून चुकते की आपण वाचणं अवघड आहे.ती पाद्रींना वडिलांचा निरोप सांगते आणि आपल्याला लपवण्याची विनंती करते. पाद्री तिला आतल्या खोलीत घेऊन जातात.तिथे आणखी काही तुत्सी बायका बसलेल्या असतात. त्यांच्यासोबत इमॅक्युली बसून राहते.अधांतरी.पुढे काय होणार याची वाट बघत.

घरी काय झालं असेल याचा अंदाज बांधत.थोड्या वेळाने तिचे दोन्ही भाऊ डॅमसीन आणि व्हिएन्ने पाद्रीच्या घरी दाखल होतात.

त्यांना पाहिल्यावर इमॅक्युलीच्या पोटात गोळा उभा राहतो. "आई-वडील कुठेयत?" डॅमसीन सांगतो,"आमची ताटातूट झाली.त्यांना पळून जावं लागलं. मोटरसायकलवर बसून ते गेले.निघताना त्यांनी आम्हाला तुझी चौकशी करायला सांगितलं.आता व्हिएन्ने तुझ्यापाशी थांबेल,पण मला जायला हवं." मग धाकट्या व्हिएन्नेकडे वळून तो त्याला बजावतो, "काहीही झालं तरी या घरातून बाहेर पडू नकोस आणि इमॅक्युलीलाही पडू देऊ नकोस.मी तुम्हाला घ्यायला परत येईन." एवढं बोलून डॅमसीन बाहेर पडतो.

आपण आपल्या लाडक्या भावाला शेवटचं पाहतो आहोत याची त्या वेळी इमॅक्युलीला कल्पनाही नसते.


संध्याकाळ होते,तसे पाद्रींच्या घरी जमलेले बाकीचे लोक पांगतात. थोड्या वेळाने पाद्री आत येतात आणि इमॅक्युलीला बाजूला बोलावून सांगतात,"तुम्हाला इथे लपवणं किती धोक्याचं आहे तुला कल्पना नाही.बाहेर इंटरहामवेच्या टोळ्या हातांत कोयते घेऊन खुले आम फिरताहेत.तुम्ही इथे आहात हे कळलं तर ते तुमच्याबरोबर मलाही खलास करायला मागेपुढे पाहणार नाहीत.

पण माझी सदस‌द्विवेकबुद्धी तुम्हाला बाहेर काढण्याचीही परवानगी देणार नाही.त्यामुळे तुम्हा बायका-पोरींना मी कसा तरी लपवेन;पण तुझ्या भावाला आणि त्याच्या हुतू मित्राला मात्र मी ठेवून घेणार नाही.त्यांना आत्ताच्या आत्ता इथून निघून जायला सांग." पाद्रींचे शब्द ऐकून इमॅक्युलीवर आभाळच कोसळतं. व्हिएन्ने तिचा धाकटा भाऊ असतो.त्याला बाहेर जायला सांगणं म्हणजे स्वतःच्या हाताने त्याला मृत्यूच्या दरीत ढकलणं. ते कसं शक्य आहे? ती पाद्रींच्या विनवण्या करते; पण त्याचा काहीही उपयोग होत नाही.


इमॅक्युली सुन्न बसून राहते. एक मन म्हणत असतं, 'आपणही भावाबरोबर बाहेर जावं.जे काही होईल ते होईल.स्वतःचा जीव वाचवून व्हिएत्रेला मरणाच्या दारात लोटण्याचा स्वार्थीपणा तरी करावा लागणार नाही.' दुसरं मन म्हणतं,"त्यांच्याबरोबर जाऊन आपण त्यांचा जीव वाचवू शकणार आहोत का? शिवाय,वडिलांनी आणि डॅमसीनने आपल्याला काही झालं तरी पार्दीच्या घराबाहेर न पडण्याची शपथ घातलीय,त्याचं काय?' तिचं मन एकदा एक ठरवतं,एकदा दुसरं.समोर सतत दृश्यं दिसत राहतात,'आपण व्हिएन्ने आणि त्याच्या मित्राला घराबाहेर काढलंय आणि बाहेर पडताक्षणी त्यांच्या शरीराच्या खांडोळ्या झाल्यायत.' तिची घालमेल खोलीतल्या इतर बायका बघत असतात.त्यात एक पन्नास वर्षांची बाई असते.इमॅक्युलीच्या आईच्याच वयाची.ती इमॅक्युलीला म्हणते, "ती पोरं आता लहान नाहीत.ती स्वतःची काळजी घेऊ शकतात.तू त्यांच्याबरोबर गेलीस तर उलट ती अडचणीत सापडतील.माझं ऐक.माझ्या मुलीलाही मी हाच सल्ला दिला असता."इमॅक्युलीला जाणवतं,की तिचं म्हणणं खरं आहे.

दुसरा पर्याय नाहीये.थोड्या वेळात पाद्री तिला मुलांच्या खोलीकडे घेऊन जातात. तिथे ही दोन तरुण पोरं शांत झोपलेली असतात. इमॅक्युलीचं मन पुन्हा एकदा हाय खातं.ती मनातल्या मनात आक्रंदन करते,पण पाद्री तिला पुढे ढकलतात. अखेर बधिर झालेल्या अवस्थेतच ती व्हिएन्नेला उठवते आणि त्याला म्हणते, "उठा.तुम्हाला दोघांना जायला हवं." व्हिएन्ने डोळे चोळत उठतो आणि तिला म्हणतो, "कुठे? मी तुला एकटीला सोडून कुठेही जाणार नाही. आणि डॅमसीनचं काय? तो इथे परत येणारेय.त्याला सोडून मी कसा जाऊ?"


इमॅक्युली लिहिते,'व्हिएन्ने त्या वेळी माझी आणि भावाची काळजी करत होता आणि मी मात्र त्याला धोक्याकडे ढकलत होते.एखाद्या आईला आपलं तान्हं बाळ कोल्ह्यांच्या तोंडी देताना काय वाटेल तशाच वेदना मला होत होत्या;पण नाइलाजाने मी त्या दोघांना समजावून घराबाहेर काढलं.त्याची पाठमोरी आकृती बघताना माझ्या मनात आलं,आता मला माझं कुटुंब बहुतेक परत.कधीच भेटणार नाही..'इमॅक्युली आपल्या खोलीत परतते.सगळं घर शांत असतं.फक्त दुरून तुत्सींच्या किंकाळ्या आणि हुतूंच्या डरकाळ्या ऐकू येत असतात.थोड्याच वेळात पाद्री हातात छोटा टॉर्च घेऊन परततात आणि इमॅक्युलीसह त्या खोलीतल्या तुत्सी बायकांना आपल्या मागून येण्याची खूण करतात. 


त्यांच्या बेडरूममध्ये मागच्या बाजूला एक चार फूट बाय तीन फुटांची छोटी,वापरात नसलेली बाथरूम असते. तिचं दार उघडून ते म्हणतात,"इथे तुम्हाला लपून राहायचं आहे."एवढ्या छोट्या जागेत सहाजणी कशा मावणार हे त्यांना कळत नाही.त्या साऱ्याजणी निःशब्द होऊन त्यांच्याकडे बघत राहतात.त्यांच्या चेहऱ्यांवरचे भाव ओळखून पाद्री म्हणतात,"ही जागा लहान आहे याची मला कल्पना आहे;पण आता इलाज नाही.बाकी सगळ्या जागा आमच्या घरातल्यांच्या वापरात आहेत. वेळ अशी आली आहे की मला माझ्या मुलांचाही भरवसा देता येत नाही.त्यामुळे लवकरात लवकर वातावरण निवळेल आणि तुम्हाला इथून बाहेर पडता येईल अशी प्रार्थना करा."


अर्थात या जागेत राहणंही कमी धोक्याचं नसतं.पाद्री त्यांना बऱ्याच सूचना करतात :"थोडाही आवाज करू नका.इंटरहामवेचे लोक आता घराबाहेर पाळत ठेवतील असं दिसतंय.टॉयलेटला जाऊ नका.अगदीच जावं लागलं तर शेजारच्या टॉयलेट फ्लशचा आवाज झाला की तेव्हाच तुम्हीही फ्लश करा.जराही आवाज बाहेर आला तर तुम्ही मेलात म्हणून समजा.तरीही तुम्ही कशा वाचणार हा प्रश्नच आहे.." शेवटचं वाक्य स्वतःशीच पुटपुटत पाद्री निघून जातात.खोलीत पूर्ण अंधार होतो. एकमेकांना खेटून त्या सहाजणी कशाबशा उभं राहण्याचा प्रयत्न करतात;पण आपल्या श्वासांची उष्णता आणि घामामुळे लवकरच आपल्याला चक्कर येणार असं त्यांना वाटू लागतं.काहीजणी बसण्याचा प्रयत्न करतात,पण सगळ्यांनी एकत्र हालचाल करण्याएवढी तिथे जागाच नसते.इमॅक्युली आणि इतर उंच बायका भिंतीला टेकून कशाबशा खाली बसतात आणि दोन छोट्या मुलींना स्वतःच्या मांडीवर बसवतात.पहाटेचे तीन वाजलेले असतात.आवाज केलात तर मारले जाल,ही पाद्रींनी घातलेली भीती त्यांना इतकी व्यापून असते,की त्या साऱ्याजणी निर्जीव वस्तूंचा ढिगारा असल्यासारख्या जराही हालचाल न करता बसून राहतात.इमॅक्युली डोळे घट्ट मिटून घेते आणि शांत होण्याचा प्रयत्न करत मनातल्या मनात प्रार्थना म्हणू लागते.तिथून पुढे देव हाच तिचा मित्र बनतो आणि प्रार्थना ही श्वासाइतकीच गरजेची क्रिया.


सकाळ होते,दिवस येतो आणि जातो,तरीही त्या तशाच बसलेल्या असतात.त्या अवस्थेत झोप लागणंही अशक्य असतं.एखादीला डुलकी लागलीच,तरी पायात आलेल्या क्रॅम्पमुळे किंवा शेजारचीचं ढोपर छातीत घुसल्यामुळे लगेच जाग येत राहते.दुसऱ्या दिवशी भल्या सकाळी त्यांना पाद्री मुरिन्झींचा चढा आवाज ऐकू येतो : "मी कोणत्याही तुत्सींना घरात थारा दिलेला नाही.मी एक भला हुतू आहे.मी असलं काम कधीही करणार नाही. जे होते त्या सगळ्यांना मी परवा रात्रीच घराबाहेर हाकललं आहे." ते ऐकून इमॅक्युली आणि तिच्या सोबतिणींची शरीरं भीतीने गोठून जातात.आता कोणत्याही क्षणी बाथरूमचा दरवाजा उघडेल आणि आपण मारले जाऊ असं प्रत्येकीला वाटत असतं.ते सहन करण्याची शक्ती एकवटत त्या बसून राहतात.पण थोड्याच वेळात पाद्रींशी बोलणारा माणूस निघून गेल्याचं त्यांच्या लक्षात येतं.त्या सुटकेचा निःश्वास टाकतात - अर्थातच जराही आवाज न करता.


या वेळी तरी आपण बचावलो;पण आपल्या आई-वडिलांचं काय,आपल्या भावांचं काय ? त्यांचं काय झालं असेल? त्यांच्यातलं कोणी तरी वाचलं असेल का? बाहेर मोकाट मारेकरी फिरत असताना आपण आपल्या भावाला घराबाहेर काढलं.देव आपल्याला कधी तरी माफ करेल का? घरच्यांचा विचार मनात आल्यावर इमॅक्युलीच्या मनात पुन्हा भीतीची लाट पसरते.थोड्या वेळाने दार उघडतं.पाद्री काहीही न बोलता एका ताटलीतून उकडलेले थंड बटाटे आत सरकवतात.सगळ्या बायका-पोरी त्या थंडगार अन्नावर तुटून पडतात.गेले दोन दिवस त्यांना अन्न-पाण्याचा कणही मिळालेला नसतो.पाद्री त्यांना चमचे देण्यासाठी परत येतात,तोपर्यंत त्या अन्नाचा चट्टामट्टा झालेला असतो.पुढेही रोजच्या रोज जेवण ही त्यांच्यासाठी चैनच ठरते.घरी तुत्सींना लपवल्याचं पाद्रींनी आपल्या मुलांनाही सांगितलेलं नसल्यामुळे सगळ्यांच्या नजरा चुकवून उरलंसुरलं अन्न आणून देणं त्यांना रोज जमणं शक्यच नसतं.त्यामुळे कधी तरी दोन दिवसांतून एकदा, कधी कधी तर चार-चार दिवस त्यांना खायला-प्यायला मिळत नाही;पण जीव वाचतोय हेच नशीब,अशी स्थिती असल्यामुळे त्याबद्दल त्यांच्या मनात काही विचारही येत नाहीत.चार दिवस उलटल्यावर इमॅक्युलीच्या मनात विचार येतो,'बाहेर आल्यावर


मी माझ्या मैत्रिणींना आणि लोकांना मोठ्या अभिमानाने सांगेन मी काय काय सहन केलं तुम्हाला माहिती नाही. पाच अनोळखी बायका-मुलींसोबत मी चार दिवस एका छोट्याशा बाथरूममध्ये अडकून पडले होते.' स्वतःला हीरो मानून दिवास्वप्न पाहत असतानाच इमॅक्युलीचं मन तिला फटकारतं, 'तुझे आई-वडील-भाऊ बाहेर जिवाच्या आकांताने पळताहेत आणि तू स्वतःची पाठ थोपटून घेतेयस?'आपण सध्या तरी बचावलो आहोत याचा आनंद मानावा,आई-वडील-भावांपासून ताटातूट झाल्याचं दुःख करावं,ते सारे जिवंत आहेत की नाही याची भीती वाटून घ्यावी,आपण कोणत्या परिस्थितीत जगतो आहोत याची कीव करावी,की बाहेर इतके तुत्सी मारले जात असताना फक्त आपणच कसे काय वाचलो याचं आश्चर्य वाटून घ्यावं?... विचारांचे सगळेच फटकारे इमॅक्युलीला जखमी करणारे असतात.दिलासा एवढाच,की तिचा सर्वांत थोरला भाऊ परदेशी असल्यामुळे नक्कीच सुरक्षित असतो.आपल्यापैकी जो कोणी जगेल-वाचेल त्याला त्याची सोबत असेल,हेच काय ते समाधान.


या विचारात असतानाच बाहेरून प्रचंड गोंधळ ऐकू येतो.

इंटरहामर्वेच्या टोळीने पाद्रींच्या घराला घेरलेलं असतं.स्वतःचं भान हरपून ते तरुण आरडाओरडा करत असतात "तुत्सींना असतील तिथून शोधून काढा. जंगलात लपले असतील तर जंगलातून.

चर्चमध्ये लपले असतील तर तिथून.पृथ्वीवर एकही तुत्सी जिवंत राहता कामा नये.." बाथरूममधल्या खिडकीला लावलेल्या पडद्याला छोटं भोक असतं.त्यातून इमॅक्युलीला जे दृश्य दिसतं ते भयावह असतं.हुतू माणसं हातांत कोयते घेऊन नंगानाच करत असतात. 'मारून टाका,मारून टाका'च्या घोषणा सुरू असतात.

त्यातली किती तरी माणसं तिच्या ओळखीची असतात.किती तरी जणांसोबत ती लहानपणी एकत्र खेळलेली असते. किती तरी माणसं गावातले प्रतिष्ठित नागरिक म्हणून ओळखली जात असतात;पण ते सगळे स्वतःची ओळख विसरून आता फक्त मारेकऱ्यांच्या भूमिकेत गेलेले असतात.जणू ही माणसं कुणी वेगळीच आहेत. त्यांच्यावर जणू हैवानाने कब्जा केलाय.


इमॅक्युली खाली बसते आणि प्रार्थना म्हणण्याचा प्रयत्न करते;पण प्रार्थनेतला एकही शब्द तिला आठवत नाही. भीतीचा आणि नैराश्याचा शरीरावर थेट परिणाम होऊ शकतो हे तिला पहिल्यांदा जाणवतं.शरीरात सळ्या खुपसल्यासारख्या वेदना होत असतात.

सैतान तिच्या मनाचा ताबा घेऊ लागतो.ती विचार करू लागते, 'देवाला हाक मारून काय उपयोग आहे? बाहेर कित्येक तुत्सी कुत्र्याच्या मौतीने मरताहेत.छोट्या बाळांना मारलं जातंय.

बायकांच्या पोटातल्या गर्भाना मारलं जातंय. त्यांना देव वाचवत नाहीये,मग तुलाच एकटीला कशाला वाचवेल तो ? आता तू वाचणं अशक्य आहे.ते जवळ आलेत.घराबाहेर येऊन पोहोचलेत.आता घरात येतील.. आता बाथरूमचं दार उघडेल.तुझ्यावर बलात्कार होईल. तुझे तुकडे तुकडे केले जातील..'


या विचारांचा लोंढा परतवण्याचा आटोकाट प्रयत्न करत इमॅक्युली डोळे झाकून बसून राहते.बाकी सगळं विसरून फक्त प्रार्थनेवर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करते.स्वतःला समजावण्याचा प्रयत्न करते,की आपण क्षुल्लक माणूस असलो तरी वाचणार आहोत.देव आपल्याला मदत करणार आहे.वडिलांनी निघण्याच्या क्षणी तिच्या हातात ठेवलेली जपाची माळ तिने घट्ट धरून ठेवलेली असते.जणू ती हातातून सुटली तर तिचा मृत्यू अटळ आहे.असा किती तरी वेळ निघून जातो. रात्री पाद्री दरवाजा उघडतात तेव्हा त्या साऱ्याजणी पूर्ण बधिरावस्थेत असलेल्या त्यांना दिसतात.त्यांच्या हाकाही त्यांना ऐकू येत नाहीत.शेवटी हलवून जागं केल्यावर त्यांची तंद्री भंगते.इमॅक्युली लिहिते, 'ते सात-आठ तास म्हणजे मला सात-आठ मिनिटं वाटली,इतकी मी प्रार्थना म्हणताना एकाग्र झाले होते.आणि तरीही त्या सात-आठ तासांत माझ्यातली शक्ती पूर्ण आटून गेली होती.माझ्या डोक्यातले सगळे वाईट विचार त्या काळात दबा धरून होते,पण त्यांना मी आत प्रवेश करू दिला नव्हता. माझ्या लक्षात आलं,की जगायचं असेल तर ती लढाई माझ्या मनातच लढली पाहिजे.भीती,नैराश्य,दुःख, असहायता या साऱ्या भावना मला खाऊन टाकण्यासाठी उत्सुक होत्या.त्यांचा विजय झाला असता तर मला कोणीच वाचवू शकलं नसतं.या लढाईत मला फक्त देव मदत करू शकत होता.'


आज मारेकरी गेले म्हणजे ते पुन्हा येणार नाहीत याची शाश्वती नसते.उलट,ते पाद्रींना बजावून गेलेले असतात, की 'आज आम्हाला तुम्ही लपवलेले तुत्सी सापडलेले नाहीत;पण आम्हाला खात्री आहे,तुम्ही त्यांना लपवलं आहे.आम्ही त्यांना शोधून काढल्याशिवाय राहणार नाही.' मारेकरी पुन्हा येतील,या कल्पनेनेही इमॅक्युलीचे हात-पाय गार पडतात;पण तिला अचानक एक कल्पना सुचते.ती पाद्रींना म्हणते, "तुमच्या खोलीतलं मोठं लाकडी कपाट तुम्ही या बाथरूमच्या समोर सरकवून घ्या.त्यांना दार दिसलंच नाही तर आम्ही सापडणंही शक्य नाही." सुरुवातीला त्यांना ते पटत नाही,पण इमॅक्युली आणि तिच्या सोबतिणींनी आर्जवं केल्यावर ते अखेरीस तयार होतात.


इमॅक्युली आणि इतर पाचजणी बाथरूममध्ये जातात तेव्हा त्यांना वाटत असतं,की एक-दोन दिवस आपल्याला इथे थांबावं लागेल.

फार फार तर दोन-चार दिवस.त्यापेक्षा जास्त काळ अशा ठिकाणी काढणं केवळ अशक्य आहे असंच त्यांना वाटत असतं.पण जसजसे दिवस जातात तसतसं इथून कधी बाहेर पडता येणार याबाबतची अनिश्चितता गडद होत जाते. कदाचित आपण कधीच बाहेर पडणार नाही,अशीही शंका त्यांच्या मनात येऊ लागते. इतके दिवस आत काढायचे म्हणजे निसर्गाच्या हाकेला ओ देणं भाग असतं… अपुरे शिल्लक भाग पुढील लेखामध्ये…!






१०/२/२६

नरसंहाराची साक्षीदार / Witness to the genocide

इमॅक्युली इलिबागिझा…!!


▶ रवांडा.मध्य आफ्रिकेतला एक छोटासा देश. १९८० च्या दरम्यानचा काळ.या देशातल्या एका छोट्या खेड्यात शाळा भरली आहे.पाचवीतली मुलं आज पहिल्यांदाच या मोठ्या,माध्यमिक शाळेत आली आहेत. त्यातच एक आहे इमॅक्युली इलिबागिझा.

शिक्षक वर्गात येतात आणि शिकवायला सुरुवात करण्यापूर्वी हजेरी घेऊ लागतात.


"वर्गात कोण कोण 'हुतू' आहेत ?"


काही मुलं-मुली हात वर करतात.


मग पुढचा प्रश्न येतो, "कोण कोण 'तुत्सी' आहेत?"


इतर काही मुलं-मुली हात वर करतात.


"कोणी 'त्वा' मंडळी आहेत का वर्गात ?"


एखाद-दुसरा हात वर येतो.


रवांडामध्ये १९९४मध्ये झालेल्या वांशिक विच्छेदामध्ये १०० दिवसांत तुत्सी जमातीतले आठ लाखांहून अधिक लोक मारले गेले. या नरसंहारातून बचावलेल्या एका तरुणीची कहाणी.


शिक्षक आपली कुत्सित नजर इमॅक्युलीवर रोखतात आणि म्हणतात,"मी हुतूंचं नाव घेतलं तेव्हा तू हात वर केला नाहीस.

तुत्सींचं नाव घेतलं तेव्हाही हात वर केला नाहीस.तू त्वा तर नक्कीच नाहीस. मग कुठल्या जमातीची आहेस तू?"


हे काय चाललंय हे न कळल्यामुळे दहा वर्षांची इमॅक्युली आधीच गोंधळलेली असते.आपण कोणत्या जमातीच्या आहोत हे तिला माहितीच नसतं.ती घाबरून म्हणते,"मला माहिती नाही सर." 'कुठल्या जमातीची आहेस हे कळल्याशिवाय परत वर्गात येऊ नकोस',असं सांगून शिक्षक तिला वर्गाबाहेर काढतात.


आपण कोणत्या जमातीचे आहोत,या प्रश्नाचं उत्तर माहिती असणं इतकं महत्त्वाचं का आहे हे इमॅक्युलीच्या समजेपलीकडचं असतं.पण पुढे हा प्रश्न तिचंच नव्हे,तर तिच्या देशाचं भविष्य उलटंपालट करणार असतो. १९९४ मध्ये सगळ्या जगाला हादरवून टाकणाऱ्या भीषण वंशविच्छेदाची ती नांदी असते. 


त्या वंशविच्छेदात होरपळून निघालेल्या इमॅक्युलीने लिहिलेलं 'लेफ्ट टु टेल : डिस्कव्हरिंग गॉड अमिस्ट द रवांडन होलोकास्ट' हे पुस्तक आपल्याला रवांडातल्या नागरिकांनी भोगलेल्या नरकयातनांची झलक दाखवतं.नाझींनी केलेला ज्यूंचा नरसंहार ही इतिहासातली गोष्ट झाली,आणि आता नव्या न्याय्य युगात अशा अमानुष घटना घडणं शक्य नाही, अशा भ्रमात जगणाऱ्या आपल्याला हे पुस्तक हादरवून सोडतं.आपल्या माणसांपासून तुटून मृत्यूच्या छायेत जगण्याची वेळ येते तेव्हा माणसांचं काय होतं याचाही अनुभव ते आपल्याला देतं.अनेक कारणांमुळे इमॅक्युली आणि तिचं रवांडा आपल्याला आपलं वाटू लागतं.


इमॅक्युली इलिबागिझा ही खाऊन-पिऊन सुखी आणि सुशिक्षित घरात जन्मलेली मुलगी.तीन भाऊ आणि आई-वडील असं प्रेमळ सुखी कुटुंब.आई-वडील दोघंही कष्टांतून शिकत वर आलेले.

शिक्षणाशिवाय गरिबी हटणं शक्य नाही याची जाण असणारे,

त्यामुळे आपल्या मुलांनी शिक्षणाकडे लक्ष दिलं पाहिजे असं मानणारे. त्यांना आपल्या वागणुकीतून समानतेचं,प्रेमाचं तत्त्व शिकवणारे.सर्व माणसं समान आहेत आणि मुलांना लहानपणापासून भेदभावांबद्दल सांगून त्यांचं बालपण कलुषित करणं योग्य नाही असं मानणारे तुत्सी जमातीतले उदारमतवादी.

त्यामुळे वर्गात वांशिक हजेरी सुरू होईपर्यंत इमॅक्युली आणि तिच्या भावंडांना आपल्या देशात काय खदखदतं आहे याची कल्पनाही नसते.


इमॅक्युलीच्या आई-वडिलांनी खरं तर त्याआधीही वांशिक विद्वेषाशी सामना केलेला असतो.त्यांच्या डोळ्यांसमोरच रवांडात अनेक उलथापालथी सुरू असतात.जर्मन अधिपत्याखाली येण्याआधी रवांडामध्ये अल्पसंख्य तुत्सींची राजवट असते.त्यामुळे अर्थातच बहुसंख्य हुतूंना दुय्यम नागरिकत्व स्वीकारावं लागलेलं असतं.जर्मन आणि नंतर बेल्जियन या दोन्ही परकीय सत्ता तुत्सी आणि हुतूंमधील संघर्ष धुमसत ठेवतात. १९५९ मध्ये बेल्जियन स्वदेशी परततात तेव्हा तुत्सींची राजवट उलथवून हुतू स्वतःचं सरकार स्थापन करतात. तुर्सीविरोधी हिंसाचाराची लाट उसळते.

त्याचा फटका इमॅक्युलीच्या आई-वडिलांनाही बसतो.पुढे १९७३ मध्ये रवांडाच्या लष्करप्रमुखांनी सत्ता हस्तगत केल्यावर देशभर हिंसाचार उफाळून येतो.त्यात तर इमॅक्युलीचं घर जाळलं जातं.

सुदैवाने हे कुटुंब एका हुतू मित्राच्या घरी लपून राहतं आणि वातावरण निवळल्यावर पुन्हा त्याच ठिकाणी घर बांधून राहू लागतं.या घटनेवेळी 


इमॅक्युली तीन वर्षांची असते.ती लिहिते,'त्या प्रसंगानंतर कधीही आई-वडिलांनी आमच्यासमोर त्या घटनेचा विषय काढला नाही की हुतूंविरोधात ते काही बोलले नाहीत.जणू ती आग म्हणजे चुकून झालेला अपघातच होता.त्यांच्या मते हुतू आणि तुत्सींमध्ये भेदभाव आणि द्वेष असण्याचं काहीही कारण नव्हतं.त्यामुळे माझे अनेक मित्र-मैत्रिणी,शेजारी हुतू होते आणि त्यांच्यासोबतच मी मोठी होत होते.'


पण इमॅक्युलीच्या आई-वडिलांनी कितीही रोखून धरलं तरी हे विद्वेषाचं लोण त्यांच्या मुलांपर्यंत पोहोचायला वेळ लागत नाही.तो द्वेष दैनंदिन आयुष्यात दिसत नसतो.वरवर सगळं शांत असतं.हुतू आणि तुत्सी एकत्र वावरत असतात,पण..इमॅक्युलीला त्याचा पहिला फटका बसतो तो तिचं शालेय शिक्षण पूर्ण होताना.


इमॅक्युली अतिशय हुशार असते आणि अभ्यासूही. त्यामुळे शालान्त परीक्षेत उत्तम गुण मिळवून चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेशासाठी आपण सरकारी स्कॉलरशिप पटकावणार याची तिला खात्री असते.त्या काळी रवांडामध्ये खासगी शाळा भयकंर महाग असतात आणि त्यांचा दर्जाही वाईट असतो.दुसरीकडे, सरकारी कॉलेजमध्ये निवासी प्रवेशासाठी निवड होणं गरजेचं असतं;पण केवळ तुत्सी असल्यामुळे वर्गात दुसरा क्रमांक येऊनही इमॅक्युलीला सरकारी कॉलेजमध्ये प्रवेश मिळत नाही.तिच्या वडिलांना घरच्या गाई विकून तिच्यासाठी खासगी कॉलेजमध्ये प्रवेश घ्यावा लागतो.ती दोन वर्ष इमॅक्युली कशीबशी त्या कॉलेजमध्ये काढते;पण नशिबाने पुन्हा एकदा सरकारी परीक्षेला बसण्याची संधी तिला मिळते आणि त्यात उत्तीर्ण होऊन तिला हव्या त्या कॉलेजमध्ये प्रवेशही मिळतो.आई-वडिलांच्या समजुतीवर शिक्कामोर्तब होतं. तुत्सी आणि हुतू हे भेदाभेद खरे नाहीत.दिवस पालटताहेत.आता वांशिक हिंसाचार मागे पडणार आहे..पण लवकरच वातावरण पुन्हा पालटतं. 


१९५९ च्या सत्तापालटावेळी युगांडामध्ये आश्रय घेतलेल्या तुत्सी नागरिकांनी रवांडन पॅट्रिऑटिक फ्रंट (आरपीएफ) नावाचं दल स्थापन केलेलं असतं.हे दल सैन्याची जुळवाजुळव करून सीमेपाशी हल्ल्याची तयारी सुरू करतं तशी देशात अशांतता पसरते.हुतू पुन्हा एकदा तुत्सींकडे संशयाने बघू लागतात. पॅट्रिऑटिक फ्रंटने हल्ला केल्यावर तुत्सी सैनिक आणि नागरिक हुतूंना मारून टाकणार अशी भीती पसरू लागते-मुद्दाम पसरवलीही जाऊ लागते.रवांडातल्या हुतू सरकारचा अशा अफवांना पाठिंबाच असतो.एवढंच नव्हे,तर सरकारच्या आशीर्वादाने 'इंटरहामवे' हे समांतर सैन्यदल स्थापन होतं आणि तुत्सींविरोधी कारवायांना सुरुवात होते.विशेषतः देशाच्या उत्तर भागात,जिथे हुतूंचं बहुमत असतं,तिथे हा गट विशेष कार्यरत असतो.किरकोळ कारणांवरून तुत्सींवर हल्ले आणि तुत्सी मुली-बायकांवर बलात्काराचं सत्र सुरू होतं.१९९० मध्ये युद्धाला तोंड फुटतं. 


रवांडन पॅट्रिऑटिक फ्रंट युगांडाच्या बाजूने देशावर हल्ला चढवतं.

देशातलं सरकार उलथवून टाकण्यासाठी आणि हुतूंचा नायनाट करण्यासाठीच तुत्सी बंडखोर येत असल्याचं हुतूंचं म्हणणं असतं,

तर सरकार उलथवणं हा हेतू नसून या निर्वासितांना पुन्हा मायदेशी परतायचं आहे,असा तुत्सींचा युक्तिवाद असतो.


दोन्ही गोष्टी आपापल्या जागी खऱ्याच असतात;आणि त्याहूनही खरं असतं ते देशभर पसरलेल्या हिंसाचाराचं आणि एकमेकांबद्दलच्या अविश्वासाचं वास्तव.या काळात इमॅक्युलीच्या वडिलांना तुत्सी बंडखोरांना छुपी मदत करत असल्याचा आरोप ठेवून अटक होते.त्यांचा हुतू मित्रच ही अटक घडवून आणतो. पुढे थोड्याच दिवसांत ते सुटतात; पण त्यानंतरही त्यांचा 'हुतू-तुत्सी भाई-भाई'चा नारा संपत नाही.पण अशा घडामोडींमुळे देशातली शांतता ढळते ती ढळतेच.


तिचा कडेलोट होतो १९९४ च्या एप्रिल महिन्यात. चोवीस वर्षांची इमॅक्युली त्या वेळी सुटीसाठी घरी आलेली असते.तिचा सर्वांत थोरला भाऊ उच्च शिक्षणासाठी परदेशी असतो पण बाकी सगळं कुटुंब मात्र घरीच असतं.इमॅक्युलीचे दोन्ही भाऊही सुटीसाठी घरी आलेले असतात.देशात अराजक माजलं असलं तरी इमॅक्युलीचे वडील मात्र आश्वस्त असतात.


एके दिवशी इमॅक्युलीचा भाऊ डॅमसीन घाबराघुबरा होऊन घरी येतो आणि वडिलांना सांगतो, की 'आपल्या गावातले हुतू हल्ल्याच्या तयारीत आहेत. त्यांच्याकडे तातडीने खात्मा करण्यासाठीची यादी आहे आणि त्यात आपली नावं आहेत.

त्यामुळे आज रात्रीच आपल्याला इथून पळ काढायला पाहिजे.' इमॅक्युलीचं घर देशाच्या पश्चिम टोकाला किवू सरोवराच्या काठाशी असतं. बोटीतून हे सरोवर पार केलं की पल्याडच्या काठावर असतो झैरे (सध्याचा डेमॉक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो) हा देश.रात्रीतून आपण बोटीने झैरेला जाऊ, अन्यथा आपण मारले जाऊ,असं डॅमसीनचं म्हणणं असतं.पण इतक्या अटीतटीच्या क्षणीही त्यांच्या वडिलांना वंशविद्वेषाची चाहूल लागत नाही,किंवा लागूनही त्यांचं उदारमतवादी मन ते मान्य करत नाही.'असल्या अफवांवर विश्वास ठेवून मी माझं घर,माझं गाव सोडून पळपुट्यासारखा पळणार नाही',असं ते जाहीर करतात आणि सुटकेचा शेवटचा मार्गही खुंटतो.


डॅमसीनने आणलेली बातमी ही अफवा नसल्याचं दुसऱ्याच दिवशी सिद्ध होतं.रात्री रवांडन पॅट्रिऑटिक फ्रंटच्या हल्ल्यात रवांडाचे अध्यक्ष मारले जातात आणि हिंसाचाराला तोंड फुटतं.भल्या पहाटेच गावातली तुत्सी मंडळी घोळक्याने इमॅक्युलीच्या घराकडे चालत येऊ लागलेली त्यांना दिसतात.इमॅक्युलीचे वडील हे त्या भागातले प्रतिष्ठित आणि चळवळे असल्यामुळे त्यांनीच आता आपलं रक्षण करावं,असं त्यांचं म्हणणं असतं. तुत्सींच्या लोंढ्याबरोबच आणखीही काही आवाज इमॅक्युलीच्या कुटुंबाला ऐकू येऊ लागतात.त्या असतात डोळ्यांत रक्त उतरलेल्या 'इंटरहामवे' गटातील हुतूंच्या गर्जना.'हुतू पॉवर' अशा आरोळ्या ठोकत हे गट तुत्सींवर चालून येत असतात.दिवसभरात इमॅक्युलीच्या घराभोवती हजोरी तुत्सींचा जमाव जमा होतो.काही न खाता-पिता मुलाबाळांसकट ते त्या ठिकाणी ठाण मांडून बसतात.मरणासन्न प्राण्याभोवती गिधाडं जमावीत तसे हुतू त्यांना मारण्यासाठी चहुबाजूंनी फिरत असतात;पण तुत्सींची संख्या बरीच असल्यामुळे त्यांच्यावर हल्ला करण्याचा त्यांना धीर होत नाही.ते दृश्य पाहून इमॅक्युलीच्या वडिलांना पहिल्यांदाच वस्तुस्थितीची जाणीव होते;पण तोवर उशीर झालेला असतो एक दिवस आणि एक रात्र पार पडते. तुर्सीमधली तरुण मंडळी हुतूंना रोखण्याचं काम करत असतात;पण हे फार काळ शक्य नाही याची साऱ्यांनाच कल्पना येते.दुसऱ्या दिवशी इमॅक्युलीचा भाऊ आणि आई-वडील तिला जवळ बोलावतात आणि त्यांच्या गावातले पाद्री मुरिन्झी यांच्या घरी जाऊन लपायला सांगतात.त्यांना भीती असते ती तरुण इमॅक्युलीवर बलात्कार होण्याची.इमॅक्युली अर्थातच त्याला तयार होत नाही.जायचं तर आपण सगळ्यांनी,असं तिचं म्हणणं असतं;पण तिचे वडील तिला जवळपास हुकूमच सोडतात,की तिने तातडीने पाद्री मुरिन्झींच्या घरी जावं. हे पाद्री हुतू असले तरी ते उदारमतवादी असतात आणि इमॅक्युलीच्या वडिलांचे मित्रही.वडिलांच्या विरोधात बोलण्याची सवय नसल्याने इमॅक्युली सापडतील ते कपडे एका छोट्या सॅकमध्ये भरून मुरिन्झींच्या घरी जायला निघते.तिच्या सोबत असतो त्यांच्याकडे सुटीसाठी आलेला तिच्या धाकट्या भावाचा हुतू मित्र.(मृत्यू पाहिलेली माणसं,गौरी कानिटकर,समकालीन प्रकाशन,पुणे) हे सगळं इतक्या झपाट्याने घडतं की आपण एखादं दुःस्वप्न तर पाहत नाही ना,असं इमॅक्युलीला वाटत असतं;पण चहुबाजूंनी ऐकू येणारा 'हुतू पॉवर'चा उन्माद तिला घडतंय ते सत्य असल्याची जाणीव करून देत असतो.आपण पाद्रींच्या घरी तरी सुखरूप पोहोचू की नाही अशी शंका तिला येऊ लागते.तसा धोका येतोच. अचानक हुतूंची एक टोळी हातांत कोयते घेऊन समोर येते.ती सारी पोरं इमॅक्युलीच्या गावात राहणारी,तिची तिच्या भावांची मित्रमंडळी असतात;पण आता त्यांच्या डोळ्यांतली ओळख पार पुसली जाऊन तिथे फक्त खून चढलेला तिला दिसतो.

आता आपण संपलो,असं वाटत असतानाच त्यांच्यातलाच एक मित्र समोर येतो आणि म्हणतो, "इमॅक्युली,तू इथे काय करते आहेस ? तुला दिसत नाही का इथे सगळ्यांची डोकी फिरली आहेत?" तो मित्र इतरांना तिला मारण्यापासून परावृत्त करतो आणि टोळीला पुढे पिटाळून घेऊन जातो.


राहिलेला शिल्लक भाग…पुढील लेखामध्ये…!!





८/२/२६

चॅन्सेलर विस्मार्क Chancellor Wismarck

मॅझिनी व मार्क्स जगाची पुनर्रचना न्यायाच्या पायावर करण्यासाठी खटपट करीत असता जुन्या संप्रदायाचे राजकारणी व मुत्सद्दी आपापले राज्यकारभार स्वार्थाच्याच पायावर चालवत होते.ते मॅकिऑव्हिलियन तत्त्वावर निष्ठा ठेवून वागत होते.एकमेकांचे प्रदेश लुबाडू इच्छित होते.मुत्सद्देगिरीच्या फसवाफसवीने ते हळूच मुलूख चोरीत व मुत्सद्देगिरीने जमले नाही व फौजा तयार ठेवीत. ( प्रशियाचा प्रतिगामी चॅन्सेलर विस्मार्क,मानवजातीची कथा,हेन्री थॉमस,अनुवाद - सानेगुरुजी,मधुश्री पब्लिकेशन )


प्रिन्स ऑटो व्हॉन विस्मार्क हा एकोणिसाव्या शतकातील अत्यंत प्रतिगामी,फसवा व दुष्ट मुत्सद्दी होता.त्याची मूठ लोखंडाची होती.तो बळाचा उपासक होता.स्वतःच्या महत्त्वाकांक्षेच्या क्षितीजापलीकडे तो पाहत असे.तो म्हणे, "राजकारणात आपला फायदा असल्याशिवाय केवळ शेजाऱ्यासाठी आपण काही करीत नसतो." त्याने जर्मनीचे एकीकरण करून प्रशियन सम्राटाच्या सत्तेखाली जर्मनी देश दिला. विस्मार्कने लष्करी शक्ती उभारून कित्येक पिढ्यांची संस्कृती रक्ताच्या वादळात नष्ट केली.

वस्तुतः तो सतराव्या शतकात शोभणारा मुत्सही होता, पण तो चुकून एकोणिसाव्या शतकात जन्माला आला.


त्याचा बाप प्रशियन सैन्यातील रिटायर्ड कॅप्टन होता. शोनॉसेन येथे त्याची इस्टेट होती.तिची व्यवस्था बापाच्या मरणानंतर विस्मार्क स्वतः पाहू लागला. वयाच्या बत्तीसाव्या वर्षी म्हणजे १८४७ साली प्रशियातील पहिल्या असेंब्लीच्या निवडणुकीत तो स्वतःच्या जिल्ह्यातर्फे निवडून गेला.या काळात प्रगतीपर वारे सुटले होतेपण बिस्मार्कने असेंब्लीकडे केलेली सारी भाषणे प्रतिगामी होती.तो अनियंत्रित राजसत्तेच्या दैवी हक्कांचे समर्थन करीत होता.ख्रिश्चन स्टेटचे समर्थन करीत होता.त्या वेळी फ्रेडरिक वुइल्यम हा राजा होता. त्याचे लक्ष विस्मार्ककडे गेले व त्याने त्याला आपल्या नोकरीत घेतले.


१८४८मधले क्रांतिकारक बंड मोडणे हे त्याचे पहिले अधिकृत काम होय.पण या क्रांतीमुळे एक गोष्ट मात्र झाली व तिच्यासाठी तरी विस्मार्कने या क्रांतीस कृतज्ञ राहणे जरूर होते.ती म्हणजे ही की,या वेळेस जर्मनीचे राजकीय नसले तरी निदान आर्थिक एकीकरण झाले. वेल्स म्हणतो,जर्मनीचे भाग विस्कळीत होते.

हाताच्या पंजाची बोटे असतात,तशी जर्मन स्टेट्स होती. 


विस्मार्कने त्यांची एकजूट करून एकमूठ केली व ती मूठ वळून इतर देशांच्या तोंडावर ठोसे देण्यास विस्मार्क उभा राहिला.जर्मनीचे साम्राज्य निर्मावयासाठी त्याने जाणूनबुजून पद्धतशीर कारवाया सुरू केल्या.त्याला जर्मन साम्राज्यासाठी वाव पाहिजे होता.अगर त्याच्याच शब्दांत सांगायचे तर सूर्यप्रकाशातील महत्त्वाची जागा त्याला हवी होती.अर्थात,उष्ण कटिबंधातील वसाहती वगैरे पाहिजे होत्या.प्रशियाचा राजा जगातील सर्वश्रेष्ठ, सर्वसामर्थ्यसंपन्न व केवळ अनियंत्रित सर्वसत्ताधीश व्हावा,अशी त्याची मनीषा होती.


प्रथम आसपासचे लहान-लहान विस्कळीत प्रदेश घेऊन ते तो खुशाल आपल्या राज्यास जोडीत चालला. जर्मनीच्या उत्तरेस श्लेज्विग व होल्स्टेन हे प्रांत होते. या दोन प्रदेशांतील लोकवस्ती अंशतः डॅनिश व अंशतः जर्मन होती.या दोन्ही प्रदेशांवर डेन्मार्कच्या राजाची सत्ता होती.पण प्रशियाच्याच राजाची हुकमत या भागावर असली पाहिजे,असे विस्मार्कने ठरवले व तो डेन्मार्कशी युद्ध करावयास उभा राहिला.ऑस्ट्रियाचा सम्राटच अद्यापि संयुक्त जर्मनीचा अधिराजा मानला जात असे.श्लेज्विग व होल्स्टेन हे आपले गेलेले प्रांत परत मिळवण्यासाठी ऑस्ट्रियाची मदत घेऊन त्याने युद्ध पुकारले.ऑस्ट्रिया व प्रशिया यांच्या संयुक्त सेना डॅनिश हद्दीत शिरल्या.डॅनिश लोकांनी फ्रान्सचा राजा तिसरा नेपोलियन याच्याशी करार करण्याचा प्रयत्न केला.पण नेपोलियन निराळ्याच उद्योगात होता. 


अमेरिकेत या वेळी चाललेल्या यादवी युद्धात तो आपली बोटे घुसवू पाहत होता.अमेरिकेतील रिपब्लिकच्या जागी तो पुन्हा पूर्वीचे जुने फ्रेंच साम्राज्य स्थापू पाहत होता.त्याने आपले सैन्य व्हेरा क्रूझ येथे पाठवले.मेक्सिकन लोकांना तो ऑस्ट्रियन राजा नकोच होता.त्याला गोळी घालून ठार मारण्यात आले.तिसरा नेपोलियन युरोपियन शेजाऱ्यांच्या घाणेरड्या भांडणात हात घालण्याला पुन्हा मोकळा झाला.


पण या वेळेपावेतो,जर्मन व ऑस्ट्रियन फौजांनी डेन्मार्कच्या राजाजवळून श्लेज्विंग व होल्स्टेन प्रांत घेतले होते.ते दोन्ही प्रदेश जर्मनी व ऑस्ट्रिया यांच्या संयुक्त मालकीचे होते.पण ही मिळालेली सारी लूट केवळ जर्मनीसाठी राहावी अशी विस्मार्कची इच्छा होती.तसेच त्याला ऑस्ट्रियाचे अधिराज्यत्व नष्ट करून स्वतंत्र जर्मन साम्राज्य स्थापावयाचे होते म्हणून त्याने ऑस्ट्रियाशी काहीतरी भांडण उकरून काढले व संरक्षक युद्ध पुकारले.

वास्तविक प्रत्येक युद्ध दोन्ही बाजूंच्या भाडोत्री प्रचारकांकडून संरक्षकच दाखवण्यात येत असते.ऑस्ट्रियाचे सैन्य दोन शत्रू देशात कोंडण्यासाठी विस्मार्कने इटलीशी करार केला व मुत्सद्देगिरीने युरोपातील इतर राष्ट्रांस त्याने तटस्थ ठेवले. त्यासाठी त्याने कोणाला खोटी वचने दिली.कोणाला खोटे सांगितले,

कोणाची खुशामत केली,कोणाला दमदाटी केली,कोणाला धाक घातला आणि आपले व आपल्या राजाचे हित साधण्यासाठी मॅकिऑव्हिलियन कोडातील प्रत्येक मार्गाचा अवलंब केला.


ऑस्ट्रियाविरुद्ध पुकारलेले हे युद्ध पटकन संपले.दोनच महिन्यात प्रशियन फौजांनी ऑस्ट्रियन सैन्यास खडे चारले.ऑस्ट्रियाचा पूर्ण मोड झाला व युरोपच्या घोड्यावर विस्मार्क आरूढ झाला.त्याने उत्तर जर्मनीतील संस्थानांचे फेडरेशन करून ते प्रशियाच्या अधिराज्यत्वाखाली आणले.एवढे केल्यानंतर तो आपल्या चढाऊ धोरणाचे पुढचे पाऊल टाकावयास निघाला.प्रशियातील लष्करी अधिकारी  धर्माधिकाऱ्यांप्रमाणे सन्मानिले जाऊ लागले. विस्मार्कच्या संतत शस्त्रघाताने व त्याच्या अहर्निश चळवळीने जर्मनीभर लष्करामध्ये नोकरी करणे हे केवळ देशभक्तीचे नव्हे;तर पवित्र व धार्मिक कर्तव्य मानले जाऊ लागले. 


प्रशियन सेनापती व्हाँ मोल्टके हा विस्मार्कच्या हाताखाली होता.त्याने स्वतःच्या देशबांधवांना व इतर राष्ट्रांनाही शिकवले,की 'युद्ध ही जगाच्या रचेनेत ईश्वरनिर्दिष्ट अशी एक आवश्यक बाब आहे.' या वेळचे विस्मार्कचे चित्र पाहा.डोक्यावर मध्ययुगीन शिरस्त्राण, निष्ठुर दिसणारे डोळे,जाड पापण्या,जबड्याची मोठी हाडे,मोठ्या लष्करी मिशा यांमुळे तो जनू प्राचीन काळातला युद्धदेवच दिसतो! तो सर्वत्र लाल रक्ताळ मुठीचा कारभार सूरू करू पाहत होता.नवे जर्मन साम्राज्य नीट सुसंघटित व बलिष्ठ करण्यसाठी व वाढविण्यासाठी विस्मार्कने फ्रान्सची कुरापत काढली.पण एकटा विस्मार्कच युद्धप्रिय होता असे नव्हे, तर तिसऱ्या नेपोलियनलाही युद्धाची खुमखुमी होतीच,भांडणाला नेहमी दोघांची जरूरी असते.जर्मनीच्या वाढत्या शक्तीचा नेपोलियनला मत्सर वाटत होता.जर्मनीला चिरडून टाकणारा घाव घालावा अशी संधी नेपोलियन पाहत होता.त्याला विस्मार्कने संधी दिली व नेपोलियनने खरोखरच चिरडणारा घाव घातला.पण तो जर्मनीवर न पडता फ्रान्सवरच पडला व फ्रान्स कोलमडला.जर्मनी व फ्रान्स यांच्यात आर्थिक तशीच राजकीय स्पर्धा सुरू होती व युद्धाचे हेच मुख्य कारण होते.एक क्षुद्र असे तात्कालिक कारणही होते;पण तात्कालिक कारणे ही नेहमीच निमित्ते असतात.चढाऊ राष्ट्र पूर्ण तयारी करून युद्धास सज्ज झाले की ते युद्धासाठी काहीतरी निमित्त शोधीतच असते.


१८७० साली स्पॅनिश लोकांनी आपल्या व्यभिचारी राणीला हद्दपार करून लिओपोल्डला गादी दिली.लिओपोल्ड हा जर्मन राजाचा चुलतभाऊ होता.नेपोलियनला काही तरी कलहकारण हवेच होते.लिओपोल्ड स्पेनच्या गादीचा वारस व्हावा ही गोष्ट नेपोलियनला मान्य नव्हती. विस्मार्क युद्धोत्सुक होताच,तो म्हणाला, "लिओपोल्ड हाच योग्य वारस आहे." नेपोलियनने जर्मनीचा राजा वुईल्यम याला लिओपोल्डची वारसदारी रद्द करण्यास सांगितले तर विस्मार्कने "शक्य ते सर्व करून लिओपोल्ड राजा निवडला जाईल असे करा." असे आपल्या राजाला सांगितले.


जर्मनीचा राजा फारसा युद्धोत्सुक नव्हता.तो नेपोलियन व विस्मार्क या दोघांनाही संतुष्ट ठेवू पाहत होता. खाजगी रीतीने त्याने लिओपोल्डला स्पॅनिश गादीसाठी उमेदवार म्हणून उभे न राहण्यास सांगितले.पण त्याने जाहीररीत्या मात्र त्याच्यावर कोणत्याही रीतीने वजन आणले नाही.येथवर जर्मन राजा व फ्रेंच सम्राट दोघेही अत्यंत सभ्यतेने वागले.पण आता वीस्मार्कने सूत्रे हाती घेऊन युद्ध भडकेल असे केले.नेपोलियनच्या एका सभ्य पुत्राला वुइल्यम राजाने एक सभ्य भाषेतील उत्तर तयार करून ते त्याला देण्यासाठी विस्मार्ककडे धाडले. या वेळी विस्मार्क एम्स येथे औषधोपचार घेत होता.म्हणून ते उत्तर त्याने विस्मार्ककडे तारेने पाठवले होते.


पण विस्मार्कने त्यातील काही शब्द गाळून ते उत्तर अशा स्वरूपात प्रसिद्ध केले की,फ्रेंचांना जर्मन व जर्मनांना फ्रेंच डाकू वाटावेत.विस्मार्कचा हेतू सफल झाला व फ्रेंचांचे आणि जर्मनीचे युद्ध जुंपले.ते वस्तुतः अनावश्यक व संपूर्ण मूर्खपणाचे युद्ध होते. त्यात फ्रेंचांचा मोड झाला व नेपोलियन पदच्युत झाला.दोहो बाजूंचे हजारो लोक ठार झाले.फ्रेंचांनी रिपब्लिक जाहीर केले.विस्मार्कचा जय झाला.


उत्तरेकडची व दक्षिणेकडची संस्थाने एक करून जर्मन साम्राज्य स्थापण्यात आले.इल्यम राजा पहिला केसर (सीझर) वइल्यम झाला.विस्मार्कचे घोडे गंगेत न्हाले. त्याची कीर्ती शिगेला पोहोचली.त्याचे मनोरथ पूर्ण झाले. त्याच्या वैभवावर कळस चढला.फ्रान्सचे अल्सेस व लॉरेन हे प्रांत बळकावण्यात आले व १९१४च्या महायुद्धाचे बीजारोपण करण्यात आले. १८७०च्या द्वेषात व १८७१च्या तहात १९१४च्या महायुद्धाची बीजे होती.युरोपचे प्रभुत्व लाभल्यावर विस्मार्क वसाहतींकडे वळला.'वसाहतींचा विस्तार' या नवीन रूढ झालेल्या शब्दांचा अर्थ असा की, 'आशिया व आफ्रिका या खंडांतील दुबळ्या देशांना प्रबळ युरोपियन राष्ट्रांनी गुलाम करणे.पौर्वात्यांच्या या लुटमारीची विस्मार्कला - त्या लुटीच्या पुरस्कर्त्याला बिलकुल दिक्कत वाटत नसे. साऱ्या हयातीत त्याने आपले कुटुंब व आपला राजा यांपलीकडे कोणालाही व कधीही सहानुभूती दाखवली नाही.इंग्लिश ज्ञानकोशात प्रो.एरिक बँडेनवर्ग लिहितो,'मानवजातीसाठी विस्मार्कला काहीही वाटत नसे.' त्याला नैतिकदृष्ट मुळी नव्हतीच.स्वतःच्या वैयक्तिक महत्त्वाकांक्षेच्या पूर्ततेसाठी मानवांना तो प्यादी समजत असे. स्वतःचे हेतू पूर्ण करून घेण्यासाठी तो मानवांच्या आशांची राखरांगोळी करी.त्यांच्या प्राणांचे हत्याकांड मांडी. पण विस्मार्कने आपली कीर्ती पाहिली, तशीच ती नष्ट झालेलीही पाहण्याचे त्याच्या कपाळी आले! कैंसर दुसरा वुइल्यम याने राजा होताच विस्मार्कला रजा दिली.आपण त्या लोखंडी,पोलादी मदतीशिवायही मानवजातीची नीट लूटमार करण्यात समर्थ आहोत,असा आत्मविश्वास या नवीन तरुण राजाला वाटत असे.


एखाद्या जुनाट हत्याराप्रमाणे विस्मार्कला फेकून देण्यात आल्यामुळे तो सम्राटाविरुद्ध जाफळत होता व आपल्या दुर्दैवाला दोष देत होता.पण त्याचा क्रोध कर्मशून्य व विफल होता. २८ जुलै १८९८ रोजी मृत्यू येईतो तो गंजलेल्या हत्याराप्रमाणे पडून राहिला.

त्याला ब्याऐंशी वर्षे आयुष्य लाभले. रक्ताच्या पायावर त्याने जर्मन साम्राज्याची उभारणी केली.पण हे सामर्थ्यसंपन्न साम्राज्य पन्नासच वर्षांत पुन्हा रक्तसागरात बुडून गेले. तो अद्वितीय मुत्सद्दी होता;पण मुत्सद्देगिरीतील अगदी प्राथमिक धडाही तो शिकला नव्हता.

हा.धडा कोणता? युद्धप्रिय बनून जग जिंकण्यास निघणे,म्हणजे साम्राज्याच्या विनाशाचा खात्रीचा मार्ग.


हा लेख समाप्त…!!