* विजय गायकवाड | Vijay Gaikawad

live

नमस्कार आपले स्वागत आहे. मी पुस्तके आणि मित्रांवर पैसे खर्च करतो,माझ्याकडे दगड आणि विटांवर खर्च करण्यासाठी पैसे नाहीत.- रस्किन बाँड.ही थोर माणसं व त्यांचे विचार मला पुस्तकात भेटलीत.ती भेटली आणि त्यांनी सांगितले कि, प्रत्येक दिवशी असं काही तरी करा की,ते तुम्हाला अधिक सुंदर उद्याच्या दिशेने खूप लांबवर घेऊन जाईल."- डोग फायरबाऊ.' सर्वियन कादंबरीकार मिलोराद पावीच यांचे एक वाक्य आहे ते म्हणतात - जोवर जगात पुस्तक वाचणाऱ्या वाचकांची संख्या बंदूकधारी सैनिका पेक्षा अधिक आहे तोवर काळजीच काहीच कारण नाही.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात.पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये.म्हणून अविरतपणे प्रयत्न करणारे मार्गदर्शक, मित्र धावून येतात.प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,डॉ.दीपक शेटे,आ.भरत बुटाले,प्रा.सर्जेराव राऊत,सुभाष ढगे,अनिल फारणे,डॉ.सुधीर सरवदे ,विश्वास खाडे, विनायक पाटील,संजय कुंभार,सतीश खाडे,मनोहर सुर्वे,गणेश खंदारे,तात्या गाडेकर, दादासाहेब गाडेकर, दादासाहेब ताजणे, पुस्तकातील घटना प्रसंग सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील यांनी केलेले आहे. मला लिहिण्याची प्रेरणा देणारी पुस्तके,लेखक,प्रकाशक,मित्र ही जगावेगळी माणसं माझ्या जीवनातील महत्वाचा टप्पा आहेत.... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ.मेघा गायकवाड, चिरंजीव मयान,माझ्या धावण्यातील गुरुवर्य नामदेव बरुरे,लुल्ला शेख मोठी ताई ,लहान ताई जयश्री शिंदे या सर्वांचेच मनापासून आभार व धन्यवाद मॅट्रिक फेल विजय गायकवाड

6/22/26

वेळेचं भान / sense of time

पृथ्वीतलावरील अनेक अक्षांश प्रदेशात साधारण शरद ऋतूमध्ये पानझड होते आणि वसंतात नवीन पालवी फुटते.आपण हे गृहीतच धरलेलं असतं.पण जरा निरखून बघितलं तर हे एक मोठं गूढच आहे.कारण असं होण्यासाठी झाडांना वेळेचं भान हवं.हिवाळा येत आहे हे त्यांना कसं कळतं? किंवा वाढलेली उष्णता ही तात्पुरती नाही तर वसंत ऋतूचे आगमन होत आहे,हे तरी कसं कळतं ?

उबदार दिवसात झाड आपल्या पानांची वाढ करतं हे तर्कशुद्ध आहे,कारण खोडातील द्रव्य वितळले तरच पुन्हा त्याचा प्रवाह सुरू होतो.पण जेव्हा हिवाळा जास्त कडक असतो तेव्हा पानं लवकर उमलतात,हे मात्र आश्चर्यकारक आहे.टेक्निकल युनिव्हर्सिटी ऑफ म्युनिकच्या शास्त्रज्ञांनी या घटनेचा हवामान नियंत्रित प्रयोगशाळेत शोध घेतला.हिवाळा थोडाजरी कमी थंड असला तरी बीचच्या फांद्यांना उशिरा पालवी फुटत होती.प्रथमदर्शनी त्यांना हे तर्कहीन वाटलं,कारण जास्त गरमी असलेल्या वर्षांमध्ये वाइल्ड फ्लावर सारखी अनेक वनस्पतींची वाढ जानेवारीतच सुरू होते आणि काही काहींना फुलेही धरतात.अनेकदा याची बातमी वृत्तपत्रातून येते.कदाचित असे असेल की प्रचंड गारठा असेल तरच झाडांना गाढ झोप मिळते.अशी प्रफुल्लित करणारी गाढ झोप नाही मिळाली तर वसंतात ते लगेच कामाला लागू शकत नाहीत.कारण काहीही असो. हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर हा एक तोटाच आहे, कारण इतर प्रजाती अशा प्रकारे थकलेल्या नसतात. आपली पालवी ते लगेच वाढवू लागतात आणि शर्यतीत पुढे जातात.

जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये उबदार वातावरण आपण अनेकदा अनुभवलं आहे.तेव्हा ओक किंवा बीचला पालवी फुटलेली नसते.अजून वाढीला सुरुवात करायची नाही,हे त्यांना कुठून कळतं? हे कोडं आपल्याला सुटू लागलं आहे,किमान फळं लागणाऱ्या झाडांचे तरी. झाडांना मोजता येतं हे आता आपल्या लक्षात येत आहे! काही ठरावीक उष्ण दिवस गेले की मगच वसंत ऋतूच्या आगमनाची खात्री झाडांना पटते.पण फक्त उबदार दिवसांनीच वसंत ऋतू आले,असं मानलं जात नाही.पानझड आणि नवीन पालवी फुटणे या दोन्ही गोष्टी जशा तापमानावर अवलंबून असतात तशा दिवसाच्या लांबीवरही असतात.

उदाहरणार्थ,दिवसातले किमान तेरा तास उजेड असला की मगच बीच वृक्ष नवीन पालवी सुरू करतात.हे फारच आश्चर्यकारक आहे,कारण असे करण्यासाठी झाडांना कोणत्यातरी प्रकारची दृष्टी पाहिजे.त्या दृष्टीचा शोध पानातच घेणं योग्य ठरतं.कारण त्यांच्यामध्ये सौर ऊर्जा झेलण्यासाठी जणू एक यंत्रच असते.

उन्हाळ्यात झाड सौर ऊर्जा घेत राहतात पण एप्रिलमध्ये अजून पालवी फुटलेली नसते.हे गुपित आपल्याला नीट कळलं नाही, पण बहुधा ही क्षमता कोंबांमध्येसुद्धा असते.कोंबांमध्ये पानं घडी घातलेल्या अवस्थेत शांतपणे बसलेली असतात.ती सुकून जाऊ नये म्हणून त्यांच्यावर तपकिरी रंगाचे आवरण असते.पानं वाढू लागली की या आवरणाकडे नीट बघा.त्याला प्रकाशासमोर धरले की ते पारदर्शक असल्याचे जाणवेल.अगदी थोडा सूर्यप्रकाश असला तरी त्यावरून दिवस किती मोठा आहे ते खोडांना,कोंबांना कळून चुकते.ही क्षमता तर शेतात उगवणाऱ्या काही तणांनाही असते.थोडा चंद्रप्रकाश जरी पडला तरी त्यांच्या बिया रुजायला सुरुवात होते. अशाच प्रकारे झाडाच्या खोडांनाही सूर्यप्रकाश पडल्याचे जाणवते.बहुतांश झाडांच्या खोडामध्ये निद्रावस्थेत असलेले कोंब असतात.आपला शेजारी वठून पडला की झाडाला अधिक ऊन मिळू लागते आणि मग हे कोंब बाहेर पडून प्रकाशाचा फायदा घ्यायला सज्ज होतात.

द हिडन लाईफ ऑफ ट्रीज

पी ट र वो ह्ल ले बे न

अनुवाद - गुरुदास नूलकर

अरविंद घनश्याम पाटकर

 मनोविकास प्रकाशन

पण गरमीचे दिवस वसंत ऋतूचे आहे आणि उन्हाळ्याचा शेवट नाही हे झाडांना कळतं कसं ? तापमान आणि दिवसाची लांबी या दोन्हीच्या आधाराने झाडाला हे जाणवतं.तापमानात वाढ होते तो वसंत ऋतू.तापमान घटू लागते तेव्हा शरदऋतू हेही झाडांना माहीत असते.आणि म्हणूनच उत्तर गोलार्धावरील ओक किंवा

बीच वृक्ष जेव्हा आपण दक्षिण गोलार्धात वसलेल्या न्यू झीलंडला निर्यात करतो तेव्हा ही झाडं तिथल्या उलट ऋतूचक्राशी अनुकूलन करून घेतात. आणि हो,झाडांना स्मरणशक्ती असते हेही यातून सिद्ध होते.नाहीतर त्यांना दिवसाची लांबी किंवा गरमीचे दिवस कसे मोजता येतील?

शरद ऋतूत जर का उष्णता नेहमीपेक्षा जास्त वाढली तर मात्र झाडं गोंधळून जातात.सप्टेंबर महिन्यातच त्यांचे कोंब वाढू लागतात आणि काही झाडांवर चक्क नवीन पालवी धरते.हिवाळा उशिराने आला की या गोंधळलेल्या झाडांना मात्र त्याचे परिणाम भोगावे लागतात.या नव्याने वाढलेल्या रोपट्यांचे लाकूड टणक न झाल्यामुळे ते थंडीचा मुकाबला करण्यासाठी तयार नसतात,आणि त्यांच्याबरोबर पानंही हतबल असतात. आणि मग पानांची हिरवाई गोठून जाते.हे झाडांना नक्कीच दुःखदायक असणार.आणि त्याहून वाईट म्हणजे हे कोंब निकामी झाले की पुढच्या वसंतात पुन्हा नवीन कोंब करण्यासाठी ऊर्जा खर्च करावी लागते. झाडाने सावधगिरी बाळगली नाही तर ते अशक्त राहून येणाऱ्या ऋतूचा सामना करणे त्यांना मुष्कील जाते.

पालवी फुटण्याची वेळ ठरविण्याव्यतिरिक्तही झाडांना वेळेचे भान असणे गरजेचे असते.विशेषतः प्रजननात हे महत्त्वाचे असते.

त्यांच्या बिया जर शरद ऋतूत जमिनीवर पडल्या तर त्या लगेच रुजणे अपेक्षित नाही. तसं झालं तर दोन समस्या निर्माण होतात.पहिली समस्या, नाजूक कोंबांना टणक होण्यास वेळ मिळालेला नसतो म्हणून ते गारठून जातात.आणि दुसरं म्हणजे थंडीच्या काळात हरणांना खाद्य कमी असल्यामुळे ते या ताज्या हिरव्या कोंबांवर तुटून पडतात.म्हणून इतर सर्वांबरोबर वसंत ऋतूमध्ये रुजणे हेच शहाणपणाचे असते.त्यासाठी बियांना थंडीची जाणीव असते.उष्ण दिवस सलग आले की मगच ही पिल्ले आपल्या सुरक्षा कवचातून बाहेर पडतात. झाडांसारखी व्यवस्थित मोजण्याची क्षमता अनेक बियांना नसते आणि म्हणून खारी किंवा 'जे' पक्षी जेव्हा बीचचे दाणे एखाद-दोन इंच जमिनीत पुरतात तेव्हा त्यांचे फावते.जमिनीच्या या भागात वसंत ऋतूचे पूर्ण आगमन झाल्याशिवाय ऊब नसते.बर्च सारख्या हलक्या बियांना मात्र जास्त लक्ष द्यावे लागते.त्यांच्या पंखांच्या साहाय्याने ते जमिनीवर पोचून शांतपणे वाट पाहात पडलेले असतात.ते कुठे पडतात,यावर त्यांना भरपूर सूर्यप्रकाश मिळेल की पालकांसारखे त्यांनाही सबुरीने 'त्या' दिवसाची वाट पाहावी लागेल हे ठरते.

प्रश्न चारित्र्याचा..!!

'ह्यूमेल' या माझ्या गावातून 'आहर' दरीकडे जाणाऱ्या रस्त्यावर तीन ओक वृक्ष आहेत.भारदस्तपणे ते तिथे उभे आहेत आणि म्हणून या भागाला त्यांच्या नावाने सन्मानित केले आहे.सुमारे शंभर वर्ष जुन्या असलेल्या या वृक्षांमध्ये जेमतेम काही इंच अंतर आहे.हे जरा विलक्षण आहे आणि याचा अभ्यास करण्याची मला चांगली संधी आहे.

कारण तीनही वृक्ष अगदी एकसारख्या पर्यावरणीय परिस्थितीत वाढले आहेत.काही यार्डाच्या अंतरावर जमीन,पाणी आणि सूक्ष्म हवामान वेगळे असणे शक्य नाही.म्हणजे जर या तीन वृक्षात काही फरक असला तर तो त्यांच्या अंगभूत गुणधर्मामुळे असणार.आणि या तिघांचेही आचरण वेगळे आहेच!

हे वृक्ष थंडीत बोडके असताना किंवा उन्हाळ्यात गर्द पालवीने भरलेले असताना कुणी धावत्या गाडीतून यांच्याकडे पाहिले तर हे तीन वृक्ष आहेत,हे जाणवणारच नाही.जवळ असल्यामुळे हा एकच डेरा असल्याचे भासते आणि तिन्ही खोडं एकाच मुळापासून निघाल्यासारखे वाटते.छाटलेली झाडे पुन्हा उगवताना काही वेळा असे होते.पण तिन्ही ओक वृक्ष शरद ऋतूत वेगवेगळे रंग धारण करतात.उजवीकडचा ओक जेव्हा रंग बदलायला लागतो तेव्हा मधला आणि डावीकडचा अजून हिरवाच असतो.या दोन आळशी झाडांना आपल्या मित्रासारखे निष्क्रिय होण्यासाठी अजून दोन आठवडे तरी लागणार असतात.पण जर ते एकाच परिस्थितीत वाढतात तर मग त्यांच्या वागणुकीत हा फरक कुठून येतो? यावरून असं दिसतं की,पानं झडण्याची वेळ स्वभावाप्रमाणे बदलते.आधीच्या प्रकरणात पाहिल्याप्रमाणे पानझडी वृक्षांना आपली पाने झडून टाकावी लागतात.पण त्याची बरोबर वेळ कोणती? झाडांना थंडी पडण्याची बरोबर वेळ माहीत नसते.हिवाळा कडक असणार का सौम्य तेही ठाऊक नसते.त्यांना फक्त दिवस लहान होत चालल्याची आणि तापमान घटत असल्याची जाणीव होते.पण शरद ऋतूतले काही दिवस असाधारणपणे उष्ण असतात. अशा वेळेस मात्र ओक वृक्ष संभ्रमात पडतात.या हवेत प्रकाश संश्लेषण करून थोडी जास्त ऊर्जा आणि साखर बनवून ठेवायची का? की कधीही हिमवृष्टी होऊ शकेल याची सावधगिरी बाळगून पानं झडून टाकायची? या समस्येचे निवारण प्रत्येक झाड वेगळ्या पद्धतीने करत असल्याचे स्पष्ट दिसते.

उजवीकडचे झाड जरा जास्त चिंता करणारे आहे किंवा अधिक समजूतदार आहे म्हणू या.पानझड करता आली नाही आणि पूर्ण हिवाळा मरणाच्या भीतीत घालवावा लागला तर जास्त अन्नसाठा पुरवठा करून ठेवण्याचा काय फायदा? म्हणून ते वेळच्या वेळी पानझड करून स्वप्नांच्या जगात पाऊल ठेवते.पण इतर दोन वृक्ष मात्र जरा जास्त धीट आहेत.पुढला वसंत ऋतू कसा असेल किंवा कीटकांनी आक्रमण करून ऊर्जा संपवली तर खिशात काय राहणार,असा विचार करून ते अधिक काळ हिरवे कपडे घालून असतात.आणि सालापासून मुळापर्यंत जमेल तिथे तुडुंब साठा भरून ठेवतात. आजपर्यंत तरी त्यांच्या या आचरणाचा त्यांना फायदाच झालेला आहे,पण हे किती काळ चालेल कोणास ठाऊक? जागतिक तापमान बदलामुळे शरदातील तापमान जास्त काळ टिकते आणि यांची पानं धरून ठेवण्याची युक्ती नोव्हेंबरपर्यंत फायदेशीर ठरते.पण याच काळात शरदातील वादळे न चुकता येत राहतात. यामध्ये पानांनी भरलेले झाड पडण्याचा धोका जास्त असतो.माझ्या अंदाजाप्रमाणे अशा वेळेस सावधानता बाळगणारी झाडं जगण्याची शक्यता जास्त असते.

पानझडी वृक्ष आणि सिल्वर फरच्या खोडावर असेच काही तरी दिसून येते.झाडांच्या शिष्टाचार नियमावलीप्रमाणे यांची खोडे नितळ आणि उंच असली पाहिजेत.म्हणजे खालच्या भागावर फांद्या नकोत,हे शहाणपणाचे आहे.कारण खाली फारसा सूर्यप्रकाश पोचत नाही.म्हणून उगीचच खालच्या भागातले अवयव वाढवून त्यांना पोसत बसण्याची जरूर नाही.हे साधारण आपल्या शरीरासारखेच असते.जे स्नायू वापरले जात नाही त्यांना आपले शरीर फार पोषण देत नाही.पण फांद्या झाडांना स्वतःहून काही तोडता येत नाहीत.त्या गळून पडण्याची त्यांना वाट पाहावी लागते.त्यांना बरशीच्या हवाली सोडन दिले की लाकूड कुजून त्या मरून जातात आणि विघटन होऊ पुन्हा त्यांचा सेंद्रिय माल मातीत मिसळतो.अशा प्रकारे फांदी जिथे तुटते तिथे झाडाला जखम होते.बरशी खोडापर्यंत वाढू शकते कारण आता तिथे साल नसते.पण ही परिस्थिती झाडाला बदलता येते. पडलेली फांदी जर एखादा इंच जाड असली तर काही वर्षांतच तिथे साल धरते.आता तिथे आर्द्रता वाढवून झाड बुरशीला मारून टाकते.पण जर तुटलेली फांदी फारच जाड असेल तर या प्रक्रियेला दीर्घकाळ लागतो. जखम काही शतके उघडी राहते आणि तिथून बुरशी आत शिरून लाकडापर्यंत पोचते.खोड कुजून अशक्त होतं.आणि याच कारणासाठी झाडांच्या शिष्टाचाराच्या नियमावलीत खालच्या भागात फक्त छोट्या फांद्या असाव्यात असं फर्मान असतं.झाड वाढताना ही खालची फांदी जर तुटून गेली तर तिथे पुन्हा नवीन फांदी येऊ द्यायची नसते. पण काही झाडं नेमके हेच करतात.

शेजारचा एखादा वृक्ष मेला आणि सूर्यप्रकाश पोचू लागला की,काही झाडं खोडाच्या खालच्या भागातही कोंब वाढवू लागतात.या फांद्या जाड झाल्या की सुरुवातीला फायदेशीर ठरतात,कारण झाडाला आता वरच्या आणि खालच्या दोन्ही भागातून प्रकाश संश्लेषण करता येणं शक्य असतं.पण एके दिवशी,सुमारे वीस एक वर्षानंतर इतर झाडं आपला डेरा इतका वाढवितात की सूर्यप्रकाश पडणारी फट बंद होऊन जाते.आता पुन्हा खालच्या भागात अंधार पडतो आणि खालच्या जाड फांद्या मरून जातात.अशा प्रकारे आपल्या हव्यासाचा परिणाम झाडाला भोगावा लागतो.पुढच्या वेळेस तुम्ही जंगलात गेला आणि एखाद्या झाडाने अशा प्रकारची वाढ केली असेल तर त्यातून त्याचे चारित्र्य दिसून येईल.झाडाचा हा स्वतःचा निर्णय असतो,याचा अनुभव तुम्हाला येईल.जंगलाच्या उघड्या भागात वाढणाऱ्या झाडांकडे जरूर पहा.त्या सर्वांना असे बेपर्वा कृत्य करण्याचा मोह होतो,पण काही थोडेच जण तसे करतात.आणि इतर झाडं मात्र आपलं खोड नितळ ठेवून सुरक्षित राहतात.

समाप्त…!!

6/20/26

दुसरा वुइल्यम / Wuilliam II

लिखित इतिहासात १९१४ सालचे महायुद्ध म्हणजे, अत्यंत भयानक आपत्ती होय.हिची जबाबदारी कोणाही एका व्यक्तीवर वा राष्ट्रावर नसून सर्व मानवजातीवरच आहे.एकोणिसाव्या शतकात सारे जगच युद्धाचे विचार शिकत होते.शांततेचे विचार जणू जगातून लुप्तच झाले होते! 'आपापल्या जाती-जमातीपुरते वागताना सभ्य गृहस्थ राहा;पण राष्ट्राचे एक घटक या दृष्टीने गुंड बना' असा संदेश प्रत्येक राष्ट्र आपापल्या लोकांना देत होते. कल्पना करा की,हत्यारबंद लोक बोस्टन,बर्लिन वा बगदाद शहरात घुसले असून कोण अधिक लुटतो,

शेवटचा कैसर सम्राट दुसरा वुइल्यम,मानवजातीची कथा,हेन्री थॉमस, अनुवाद - सानेगुरुजी,मधुश्री पब्लिकेशन.

लुबाडतो व सर्वांना दहशत वा दरारा बसवतो,याबाबत त्यांची आपसात स्पर्धा लागली आहे व तिथे पोलीस वगैरे कोणी नाहीत,कायदेशीर साधन नाही. या हत्यारबंद गुंडांविरुद्ध उपाययोजना करील असे संघटित सामाजिक यंत्रही नाही.हुबेहूब अशीच स्थिती एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्थात व विसाव्या शतकाच्या सुरुवातीस जगातील बलाढ्य राष्ट्रांची होती.

युरोपातील प्रबलतर राष्ट्र जागतिक प्रमाणावर उठाठेवी व दंगामस्ती करणारी होती.युरोपात एक विशिष्ट मनोवृत्ती सर्वत्र बळावत होती. ही विशिष्ट राष्ट्रीय मनोवृत्ती जंगलच्या कायद्यावर उभारलेली होती.'बळी तो कान पिळी' हे या सर्वांचे ब्रीदवाक्य होते. 'आमच्या देशातले जे आम्हाला हवे असते ते आम्ही विकत घेतो, पण इतर देशांतले जे आम्हाला हवे असते,ते आम्ही चोरून घेतो.' असे सारी बलाढ्य राष्ट्र म्हणत.ती चढाऊ राष्ट्र घाणेरड्या व निंद्य खेळात मग्न झाली.पूर्वे कडील दुबळी राष्ट्र लुटायची हा जणू सर्वांचा धर्मच झाला! ती याला 'डाकूगिरी' म्हणत नसत,तर 'संरक्षण' म्हणत असत,फ्रान्सने अल्जीअर्स,मादागास्कर आनाम व टोंकिन यांचे संरक्षण करण्याचे ठरवले व त्यांना आपल्या पंखाखाली घेतले.ऑस्ट्रिया तुर्काच्या विरुद्ध रक्षण द्यायला उभा राहिला.बोस्निया व हर्झगोविना या प्रदेशांना त्याने जवळ घेतले.रशिया पोर्ट आर्थरचे रक्षण करायला गेला व जपानशी १९०४-०५ साली त्याचे युद्ध झाले.जर्मनी आफ्रिका व आशिया या खंडांत संरक्षणासाठी धावू लागला.त्याचे हे संरक्षित टापू होते. इंग्लंड सर्वांत जास्त चढाईखोर होते.हिंदुस्थान,इजिप्त, आयर्लंड इत्यादी दहाबारा देशांवर इंग्लंडने आपले पंख पसरले होते.रस्त्यातल्या एखाद्या लहान मुलाजवळची उसाची कांडी घेण्याचा जसा कोणालाही बिलकूल हक्क नसतो,तसाच या प्रबळ राष्ट्रांना दुबळ्या राष्ट्रांची मालमत्ता लुबाडण्याचा यत्किंचितसुद्धा हक्क नव्हता. पण राष्ट्रीय नीती व्यक्तीच्या नीतीच्या पाठीमागे शेकडो वर्षे असते.आपापल्या शासनसंस्थांच्या वतीने कारभार हाकणारे मुत्सद्दी आंतरराष्ट्रीय कारभारात असे वागतात की,तसे खाजगी नागरिक या नात्याने वागण्याचे ते स्वप्नातही मनात आणण्याचे धाडस करणार नाहीत. जर्मनी, फ्रान्स, इंग्लंड, रशिया, ऑस्ट्रिया व इटली इत्यादी राष्ट्रांनी जगाला चक्क जाहीर केले की, 'दुबळ्या राष्ट्रांवर सत्ता गाजवणे हे आमचे ईश्वरदत्त कर्तव्य आहे. हे भाग्य आम्हाला ईश्वराने दिले आहे!' व ती सर्व दुबळ्या राष्ट्रांना लुटावयास व गुलाम करायला पुढे सरसावली.वसाहतींचे साम्राज्य मिळवण्यासाठी वेडी स्पर्धा जोरात सुरू झाली. या स्पर्धेतून लवकर अथवा उशिरा जागतिक युद्ध पेटणार,यात शंका नव्हती, कारण या चढाऊ राष्ट्रांच्या परस्पर हितसंबंधांचे पुष्कळ वेळा खटके उडत,संघर्ष होत.ज्यांनी उत्कृष्ट प्रदेश आधीच बळकावले होते, त्यांच्याकडे इतर देश द्वेषाने व मत्सराने बघत.कारण त्यांना लुटीतला फारसा फायदेशीर वाटा मिळालेला नसे.पुष्कळदा एकाच तुकड्यावर अनेकांचे गिधाडी डोळे लागलेले असत.या स्पर्धेतून शस्त्रास्त्रांची स्पर्धा सुरू झाली.तोफांचा आवाज ईश्वर आवाजाप्रमाणे पूजिला जाऊ लागला.

सारे जग युद्धोत्सुक झाले. 'युद्ध', 'युद्ध' असा आवाज सर्वत्र घुमू लागला.प्रत्येक देशातील हरएक तरुणास शिकवण्यात येई की,दुसऱ्या देशातील दहांना तो भारी आहे.ही लढाऊ मनोरचना ऑस्ट्रिया जर्मनीतल्याइतकीच इंग्लंडमध्येही ठसविण्यात आलेली होती.जुन्या जगातील इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी, ऑस्ट्रिया, इटली, रशिया ही प्रबळ राष्ट्र १९१४ मधील महायुद्धासाठी अगदी कंबर कसून तयार होती.खुंट्या नीट पिरगळलेल्या होत्या डेव्हिड स्टार जॉन्सन याच्या शब्दात सांगायचे म्हणजे 'युरोपचे पिस्तूल भरलेले होते आणि एकदम स्फोट झाला.'म्हणून मागील महायुद्धाला साम्राज्यशाही स्पर्धा हेच मुख्य कारण होते.हे क्लेमेंकोच्या कारकिर्दीवरून लक्षात येईल.

क्लेमेंकोला 'वाघ' असे नाव होते व त्याबद्दल त्याला अभिमान वाटे. किप्लिंग हा या साम्राज्यशाहीचा महाकवी होता.काळ्या लोकांचे ओझे गोऱ्या लोकांना कर्तव्य म्हणून वाहावे लागते व गोरे लोक जगाचे प्रभू होण्यासाठीच जन्मलेले आहेत असे तो म्हणे.नित्शेचे मन सौंदर्य व वेडेपणा यांच्या दरम्यान लंबकाप्रमाणे हेलकावे खात असे.नित्शे स्वतः कोमल मनाचा व प्रेमळ स्वभावाचा होता. पण त्याने जगाला द्वेषाचे व युद्धाचे उपनिषद दिले.झार निकोलस याच्या धोरणात हीच साम्राज्यशाहीची उद्दामता होती.त्याची कारकीर्द ज्यूंच्या छळासाठी व फटाक्यांच्या थैमानासाठी प्रसिद्ध आहे.पण सम्राट दुसरा वुइल्यम यांच्या अहंमन्य शब्दांनी व रानवट कृतींनी या सर्वांना रंगरूप आले.

वुइल्यम होएनझोलर्न याने एकट्यानेच मानवजातीला युद्धात ढकलले असे नव्हे.तो अनेक साम्राज्यवाद्यांपैकी एक होता.पण त्याचा आवाज सर्वांहून बुलंद होता. त्याची घनगर्जना होती.जे अपराधी होते,युद्ध पेटवण्याचा गुन्हा करणारे होते,त्यात हा वुइल्यम पटकन उमटून पडे. दुसरे गुन्हेगार आपले पाप गुप्तपणे,मुत्सद्देगिरीच्या पडद्याआड,गाजावाजा न करता,मोठ्या शिताफीने करीत.त्यामुळे पुष्फळ अविवेकी इतिहासकार त्यामागील महायुद्धातल्या माणुसकीस काळीमा लावणाऱ्या गोष्टींचे खापर एकट्या वुइल्यम कैसरच्याच डोक्यावर फोडतात.

पण आपण लक्षात ठेवले पाहिजे की,कैसर हा एकटाच काही गुन्हेगार नव्हता.विसाव्या शतकातला पोषाख केलेल्या,पण केवळ रानटी व अत्यंत प्राचीन काळच्या जंगली पूर्वजांप्रमाणे असलेल्या,साम्राज्यवादी लोकांचा तो एक प्रतिनिधी होता.जवळजवळ प्रत्येक देशात असे लोक होते आणि तेच राज्यकारभार चालवीत असत,ही बस्तुस्थिती ध्यानी धरून कैसर वुइत्वमचे जीवन आपण पाहू या.

कैसर एकोणीस वर्षांचा असताना म्हणजे १८५९ साली त्याची आजी,इंग्लंडची राणी व्हिक्टोरिया,ही हिंदुस्थानची सम्राज्ञी म्हणून घोषणा करण्यात आली. त्याच वेळी त्याने मनाशी खूणगाठ बांधून ठेवली की,मी जेव्हा जर्मनीचा राजा होईन तेव्हा मीही असाच सम्राट होईन व वाटेल ती किंमत देऊन जर्मन साम्राज्य वाढवीन.त्याचे वडील तिसरे फ्रेडरिक हे १८८८ सालच्या जून महिन्यात वारले.त्यांनी फक्त तीनच महिने राज्य केले.वुइल्यमला राज्याभिषेक झाला. त्याने गादीवर येताच चॅन्सेलर बिस्मार्क याला काढून टाकले व आपण एकट्याने राज्य चालवायचे ठरवले.वुइल्यम फार उंच नव्हता.त्याचा डाव हात सुकलेला होता.त्याची बुद्धीही काही मोठी अपूर्व नव्हती,पण तो स्वतःला आपल्या अहंकाराच्या आरशात पाही. 'आपण महाप्रभू आहोत', 'ईश्वराच्या खालोखाल जर कोणाचे वैभव असेल, तर ते आपलेच', असे त्याला वाटे. त्याने आपल्यासमोर जणू जिहोव्हाचा आदर्श ठेवला होता. तो तद्‌नुसार वागत होता.त्याच्याप्रमाणे आपणाला बनवू पाहत होता.आपले यशोवैभव वाढवण्यासाठीच मानवजात आहे,असे त्याला वाटे.कीर्तीची अपरंपार भूक त्याला होती.आपल्या पिढीतील जास्तीतजास्त मोठा आवाज करणारा आपणच व्हावे असे त्याला वाटे. सारी राष्ट्रे आपणाकडे पाहत राहतील अशा रीतीने आपल्या तलवारीचा खणखणाट करण्याचे त्याने ठरवले होते.ब्रिटानिया समुद्राची स्वामिनी होती.कैसरनेही भूमीचा तसाच समुद्राचाही स्वामी होण्याचे ठरवले. त्याचे निर्दय व कठोर डोळे जगाला कः पदार्थ मानीत. त्याच्या मिशांची दोन्ही टोके वर पिळलेली असतजणू तो स्वर्गालाही तुच्छ मानीत होता,स्वर्गालाही ऐट दाखवत होता !

सारी राष्ट्र तलवारीच्या साधनाने आपापली राज्ये-साम्राज्ये वाढवण्यासाठी धडपडत होती,स्पर्धा करीत होती."ठीक." कैसर म्हणाला, "या सर्वांना जर्मन राष्ट्र तलवार कसे धरते ते दाखवून देतो." सारे इंग्लंड युद्धभावनांनी नाचत होते. पुढील गीत सर्वांच्या ओठावर होते - "आम्हाला लढण्याची इच्छा नाही,पण लढण्याची वेळच आली तर आमच्याजवळ भरपूर आरमार आहे,भरपूर द्रव्यबळ आहे व भरपूर मनुष्यबळही आहे."

इंग्लंडचे आव्हान वुइल्यमने स्वीकारले,"मीही माझ्या जर्मनीला माझ्या हयातीत सैन्य,संपत्ती, व गलबते मांनी संपन्न करतो..”अशी घोपना करून तो प्रतिज्ञेवर सांगे.

की, "माझे सारे जर्मन राष्ट्रच शिपाईगिरीचा पेशा पत्करील.विजयी चढाई हेच माझे जीवितकार्य!" राज्यावर येताच तो म्हणाला,"सैन्यावरच माझी सारी भिस्त आहे.'आपल्या जर्मन राष्ट्राला शिस्त शिकवायला, शिक्षण द्यायला व संघटित करायला तो उभा राहिला. कत्तलीसाठी तो त्यांना पुष्ट करू लागला.इतिहासातील अत्यंत अव्यंग असे युद्धतंत्र त्याने निर्माण केले व ते खरोखरच इतके परिपूर्ण होते की,ते शेवटी वाटोळे फिरले व निर्मात्याचाच निःपात करते झाले.

वुइल्यम जगभर प्रवासार्थ निघाला.लंडन, रोम, व्हिएन्ना, अथेन्स, कॉन्स्टॉटनोपल इत्यादी शहरांतून तो मिरवीत गेला.आपण किती अद्भुत पुरुष आहोत हेच जणू जगाला दाखवू पाहत होता.तो पॅलेस्टाईनला गेला व घोड्यावर बसून जेरुसलेम शहरात शिरला.देवाप्रमाणेच त्याला मिरवत नेण्यात आले.त्याच्या खास प्रवेशासाठी तेथील भिंतीला मुद्दम नवीन दरवाजा करण्यात आला होता.नेहमीच्या सामान्य दरवाजातून जाणे कैसरला कमीपणाचे होते..जगातील सर्वांत मोठे आरमार आपल्यापाशी असावे म्हणून १८९५ साली त्याने इंग्लंडशी स्पर्धा सुरू केली. तो म्हणाला, "माझे लष्कर ज्या दर्जाचे आहे,त्याच पराकोटीला माझे आरमार नेल्यावाचून मी स्वस्थ बसणार नाही."

आणि इतर राष्ट्रही स्वस्थ बसली नव्हतीच, डेन्मार्क व हॉलंड यांसारखी काही राष्ट्र सोडून दिली तर इतर प्रत्येक देशाच्या अंदाजपत्रकात उत्पन्नाचा नव्वद टक्के भाग युद्धावरच खर्च होई,संरक्षक व आक्रमक दृष्टींनी दोस्ती करण्यात येई.इंग्लंड, फ्रान्स व रशिया यांनी आपला एक दोस्त संघ बनवला,तर जर्मनी व ऑस्ट्रिया यांनीही आपली गट्टी केली.ज्याच्यावर सूर्य कधीही मावळत नाही,असे आपले अवाढव्य साम्राज्य वाढवण्याचा निर्धार इंग्लंडने केला होता. आशिया व आफ्रिका खंडांतले आपले साम्राज्य टिकवायचे व १८७० साली जर्मनीने बळकावलेले अल्सेस व लॉरेन्स हे प्रांत परत घ्यायचे,असे फ्रान्सच्या मनात होते. रशिया भयभीत झाला होता.वसाहतींच्या चढाईत जर्मनीची स्पर्धा पाहून त्याच्याही तोंडाला पाणी सुटले.त्याचाही स्वार्थ जागृत झाला.युद्ध लवकर सुरू व्हावे म्हणून शक्य ते सर्व ऑस्ट्रिया व जर्मनी यांनी केले.कैसरला गर्व चढला होता.तो दटावीत होता,दरडावीत होता,आपल्या मोठेपणाची गर्जना करीत होता आणि महायुद्धाचा दिवस कधी येतो,याची वाट पाहत होता.

१९१४ साली दोन्ही पक्ष तयार झाले होते.युद्ध सुरू करण्यासाठी सारेच जण एखाद्या निमित्ताची वाट पाहत होते.फर्डिनंड हा ऑस्ट्रियाच्या गादीचा वारस होता.तो बोस्नियाची राजधानी सारायेव्हो येथे गेला होता.हा प्रांत आरंभी सव्हियाचा होता.तो तुर्कांनी घेतला होता व तुर्काच्या हातून सरतेशेवटी ऑस्ट्रियाने बळकावला होता.१९१४ सालच्या जूनच्या अठ्ठाविसाव्या तारखेस एका देशप्रेमी सर्व्हियन विद्यार्थ्याने सारायेव्हो येथे फर्डिनंडचा खून केला.सर्व्हियाचा प्रदेश ऑस्ट्रियाने गिळंकृत केलेला पाहून तो विद्यार्थी चिडला होता.

ऑस्ट्रियाने जुलैच्या अठ्ठावीसाव्या तारखेस सर्व्हियाशी युद्ध पुकारले.रशिया अशा एखाद्या संधीची वाटच पाहत होता.सर्व्हियाला मदत करण्याच्या मिषाने ऑस्ट्रिया व जर्मनी यांच्याविरुद्ध आपल्या सैन्याच्या हालचाली त्याने केल्या.जर्मनीने रशियाविरुद्ध व रशियाचा गुप्त मित्र फ्रान्स याच्याहीविरुद्ध सुरू युद्ध पुकारले.युद्धाच्या पहिल्या घोषणेनंतर आठच दिवसांत हा वणवा सर्वत्र भडकला.युरोपातील सर्व प्रमुख राष्ट्र कत्तली करण्याचा गुन्हा करू लागली.रक्ताचा सडा घालण्यात आला.एक कोटी मानवांचा संहार झाला.

१९१७ साली अमेरिकाही युद्धात ओढली गेली.भीती, स्वार्थ व अभिमान यांच्या संमिश्र भावना अमेरिकेस युद्धात खेचत्या झाल्या. 'जर्मनांचा जय झाला तर?' अशी भीती खरोखरच काही अमेरिकनांना वाटे विजयी कैसरचीही त्यांना धास्ती वाटे.दोस्तांना दारूगोळा पाठवणाऱ्या काही कारखानदारांना जर्मनीच्या पाणबुड्यांचा त्रास होत होता. १९१५ सालच्या मे महिन्यात जर्मन पाणबुड्यांनी योग्य सूचना देऊन लुसिटानिया ही अमेरिकन बोट बुडवली.ही दोस्तांसाठी तोफा नेत होती.काही उतारूही तिजवर होते.प्रेसिडेंट वुइल्सने कैसरला एक कडक पत्र लिहिले.पण आपल्या देशबांधवांना तो म्हणाला, "मी क्षुद्रासारखे एकदम युद्ध सुरू करणार नाही." १९१६ साली वुइल्सनच पुन्हा प्रेसिडेंट निवडला गेला.त्याच्या निवडणुकीचे घोषवाक्य 'मी अमेरिकेला युद्धापासून अलिप्त ठेवले' हे होते. प्रत्येकाच्या ओठावर 'मी माझा मुलगा लढाईत मारण्यासाठी नाही वाढवला!' हे गाणे होते. अमेरिकेतील बहुजन समाजाचे मत या गीतात होते. पण प्रेसिडेंट म्हणून निवडून आल्यानंतर दोनच महिन्यांत वुइल्सनला जर्मनीविरुद्ध युद्ध पुकारावे लागले. 'अमेरिकेच्या गलबतास धक्का लावू नका' असे त्याने कैसरला बजावले, तेव्हा कैसरने जबाब दिला की, 'आमच्याविरुद्ध असणाऱ्या दोस्त राष्ट्रांना दारूगोळा पुरवणे बंद करा.' वुइल्सनसमोर दोनच मार्ग होते. एक तर दारुगोळा पाठवणे बंद करणे किंवा जर्मनीबरोबर युद्ध पुकारणे. त्याने पहिला मार्ग पत्करला असता तर शस्त्रास्त्रे व दारूगोळा तयार करणाऱ्या कारखानदारांचे नुकसान झाले असते.पण अमेरिकेत शांतता राहिली असती.वुइल्सनने दुसरा मार्ग पसंत केला.तो शाळा मास्तराच्या वृत्तीचा होता.दुसऱ्यांसाठी तो कायदा करी.पण स्वतःकधी कोणाचा सल्ला घेत नसे. कैसरने वुइल्सनचे मानण्याचे नाकारले.तेव्हा त्याला धडा शिकवण्यासाठी त्याने अमेरिकन मुलांना युरोपात पाठवण्याचे ठरवले.तेव्हा त्याला धडा शिकवण्यासाठी त्याने अमेरिकन मुलांना युरोपात पाठवण्याचे ठरवले. प्रथम युद्ध न करण्याची स्वाभिमानता वुइल्सनजवळ होती;पण आता युद्धापासून दूर राहणे त्याच्या गर्वास व अभिमानास पटेना.

कैसर गमावली जाणारी लढाई लढत होता.म्हणून तर त्याने निकरावर येऊन निर्दयपणे आणि हट्टाने पाणबुड्यांची लढाई सुरू केली होती.त्याने शेवटचा पत्ता टाकला होता.अमेरिका युद्धात ओढली गेली.कैसरचे लष्करी तंत्र कोलमडण्याला आता केवळ काही महिनेच अवकाश होता. ते १९१८ सालच्या उन्हाळ्यात गडगडले.जर्मन सैन्याचा धुव्वा उडाला! ते पळत सुटले ! कैसर गलबतात बसून पळून गेला.भेदरलेल्या सशाप्रमाणे तो हॉलंडात गेला.त्याने लाखो लोकांना युद्धाच्या खाईत लोटले.पण ते मरणसंगीत स्वतः ऐकण्याचे धैर्य मात्र त्याला नव्हते.हॉलंडमध्ये डॉर्न येथे तो हद्दपारीत राहिला.त्याच्या जीवनातील आवाज आता बंद पडला,मंद झाला.आता गडबड नव्हती,गर्जना नव्हती,सारे शांत होते. लष्करी आक्रमणकाळात तो जितका सुखी होता.त्यापेक्षा अधिक सुखी तो हॉलंडमध्ये असेल अशी आशा करू या.

त्याच्या आडदांड कारकिर्दीने जगाला दोन गोष्टी पटवल्या... १.राजेशाही ही आता एक जुनाट गोष्ट झाली होती. २. यापुढे आंतरराष्ट्रीय.अनियंत्रित स्पर्धेच्या जागी आंतरराष्ट्रीय सहकार्य आले पाहिजे,तरच मानवजात वाचण्याचा संभव आहे. १९१४ सालच्या युद्धासारखी जगव्याळ आपत्ती पुन्हा जगावर येता कामा नये.

।।। समाप्त ।।।




6/18/26

दख्खनचा अकबर / Akbar of the Deccan

जलालुउद्दीन अकबराच्या सत्तेचं चोविसावं वर्ष चालू असताना विजापूरच्या अदिलशाहच्या तख्तावर दहा वर्षांच्या एका मुलाला बसवण्यात आलं.'इब्राहिम द्वितीय' हा तो मुलगा मुघल बादशाहपेक्षा वयाने कित्येक वर्षं लहान होता.पण या दोघांची भेट झाली असती,तर त्यांना एकमेकांच्या संगतीत फार आनंद लाभला असता. त्यांच्यात भौगोलिक अंतर होतंच;पण त्याचबरोबर पिढ्यांचंही अंतर होतं.तसं असूनही मोगल बादशाह आणि दख्खनचा हा सुलतान यांच्यात खूप साम्यही होतं.दोघंही कलेचे आश्रयदाते होते,कर्तबगार होते आणि करिष्माई होते.तसंच 


आपल्या आजच्या काळाशी जुळणारी अशी त्या दोघांची कुठली गोष्ट असेल तर त्या दोघांनी ज्या समाजावर राज्य केलं, त्या समाजांच्या वैविध्यपूर्ण सहजप्रेरणांना त्यांनी कवेत घेतलं. असं करून त्यांनी एका भव्य, देखण्या युगाला जन्म दिला. त्यांनी अशा एका मार्गावरचे दिवे उजळवले जे अजूनही, म्हणजे या दोघांनाही थडग्यात जाऊन शतकं लोटली, तरीही प्रकाशमान आहेत.


अकबराच्या धार्मिक दृष्टिकोनांचं लोकांनी आकलन करून घेतलं आणि त्याविषयी लेखनही केलं. त्यामागे त्याचा धाक होता.परंतु या बादशाहच्या सावलीमध्ये 'इब्राहिम द्वितीय' हा तुलनेने लहान राजा मात्र इतिहासाच्या विस्मृतीतच गेला.


गणिका,महात्मा,आणि एक इटालियन ब्राह्मण,भारतीय इतिहासातील अज्ञात कहाण्या,एस.पिल्लई,अनुवाद-

सविता दामले 


विजापूरचा 'इब्राहिम आदिलशाह द्वितीय' हा फारच आश्चर्यकारक माणूस होता,ते केवळ तो नखं लाल रंगाने रंगवायचा म्हणून नव्हे,लहानपणीच त्याची भेट एकदा काही शिवभक्तांशी झाली,तेव्हा त्यांच्याशी आलेल्या संवादाचा त्याच्यावर एवढा प्रभाव पडला की,त्यामुळे त्याच्या मनात हिंद परंपरांविषयी आयुष्यभर पुरेल आकर्षण निर्माण झालं.म्हणजे औपचारिकरीत्या तो सुन्नी मुस्लीम असला तरी तो मेला तेव्हा त्याचा खरा धर्म कुठला याविषयी एवढा संशय निर्माण झाला होता की,सर्व संबंधितांना आश्वस्त करण्यासाठी त्याच्या कबरीवरील शिलालेखावर कोरण्यात आलं,"नाही, सत्य हेच आहे की इब्राहिम हा ज्यू नव्हता की ख्रिश्चनही नव्हता.तो मुस्लीमच होता,त्याची श्रद्धा विशुद्ध होती.तो मूर्तिपूजक तर नक्कीच नव्हता." आता ही शेवटची ओळ तर पूर्ण खोटीच होती. कारण आदिलशाहचं विश्वच मुळी हिंदू प्रभावाने ओतप्रोत भरलेलं होतं.त्याच्या कारकिर्दीत त्यानं बऱ्याच मंदिरांना देणग्या दिल्या,यात्रेकरूंना सुप्रसिद्ध तीर्थस्थानांवर जायचे अधिकार बहाल केले आणि हिंदू देवतांना राजभक्तीच्या उंचीवर जाणीवपूर्वक नेलं.


पण हे जे काही लिहिलं आहे ते लिहिताना या सभ्य (!) शहजाद्याच्या (अकबरासारख्याच) लष्करी अवताराकडे दुर्लक्ष करण्यासाठी नव्हे.या लष्करी पराक्रमात भावांना आणि वर्चस्व गाजवणाऱ्या पालनकर्त्यांना (बालवयाच्या राजाला सांभाळणाऱ्या लोकांना) ठार मारणं बसत होतं. पण तो सौम्य आणि तुलनेने अधिक विधायक मनःस्थितीत असे,तेव्हा तर हा इब्राहिम दुनियेला आपल्या मोहात पाडू शकत होता.त्याच्या बऱ्याच फर्मानांची सुरुवात हिंदू देवता सरस्वतीस आवाहन करून होत होती.त्याची ही या देवीवरची भक्ती एवढी उघड होती की,त्याच्या दरबारातल्या एका गटाची तर खात्रीच झाली होती की,हा सुलतान एक तर गुप्तपणे हिंदू धर्माचं पालन करत असला पाहिजे किंवा मग तो स्वधर्मत्यागाच्या उंबऱ्याशी पोहोचला असला पाहिजे.एका टप्प्यावर तर त्यानं विजापूरचं (मूळ विजयपूरचं) नाव 'विद्यापूर' ठेवलं होतं.त्यानं लिहिलेल्या एका कवितेत अशा काही संकल्पना व्यक्त केल्या होत्या की,कर्मठ मुस्लीमांना त्या मूळ इस्लामी विचारांपासून खूप दूर जाणाऱ्या आणि त्यांच्या कट्टर छापाच्या इस्लामविरोधी वाटल्या होत्या.उदाहरणार्थ,त्यानं कवितेत लिहिलं होतं की:


भाषा वेगवेगळ्या असतात;

पण भावनिक आवाहन एकच असतं.

मग तो ब्राह्मण असो की तुर्की,

ज्याच्याकडे पाहून विद्येची देवता (सरस्वती) हसते

तोच भाग्यवान ठरतो.


खरोखरच,या इब्राहिमने त्याचं सुप्रसिद्ध 'किताब इ नवरस' हे पुस्तक प्रसिद्ध केलं तेव्हा त्यानं जगाला चित्रपूर्ण शैलीचा.रूपकांनी भरलेला असा एक लक्षवेधी ग्रंथ तर दिलाच पण त्याच्या काळात जे वेगवेगळ्या धर्माचं मीलन होत होतं,त्याचं ओझरतं दर्शनही त्यानं त्यातून घडवलं.


हे पुस्तक राजकारणाच्या जगाचा संदर्भ तर देतंच; पण ते त्याच्या राजेशाही घराचंही दर्शन घडवतं. त्यात योद्धा राणी चांदबिबीसारख्या व्यक्तिरेखांचा उल्लेख आहे तसंच त्याचा पाळीव हत्ती अताश खान याचाही उल्लेख आहे.शिवपार्वतीसारख्या हिंद देवदेवता त्यात आहेत आणि महान संस्कृत महाकाव्यांचाही परिणाम त्याच्यावर झालेला दिसतो.लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे,त्यानं बरीच चित्रं काढवून घेतली त्यांत एक सरस्वतीचं चित्रही होतं.त्यात ती सोन्याच्या सिंहासनावर सोबत मोर,शंख,वीणा,कमळ इत्यादी सर्व पारंपरिक वाद्ये आणि प्रतीके यांच्यासह बसलेली दिसते.परंतु आजच्या तिच्या परिचित रूपापेक्षा किंवा पुरातनकालीन शिल्पांतील रूपापेक्षा इब्राहिमची सरस्वती शुभ्रवसना असूनही ती पटकन ओळखता येणाऱ्या हिंदू शैलीत न दिसता राजघराण्यातल्या मुस्लीम राजकुमारीसारखीच अधिक दिसते. त्याचप्रमाणे त्या चित्रात लिहिलेले पुढील शब्दही या इब्राहिम आदिलशाहला त्या देवीबद्दल केवढं प्रेम होतं ते व्यक्त करतात.तिथे लिहिलं आहे - इब्राहिम म्हणजे तोच ज्याचा पिता 'गुरू गणपती' असून माता 'पवित्र सरस्वती' आहे.त्यामुळेच तर दरबारातले काही लोक त्याच्यावर क्रुद्ध झाले होते यात काहीच नवल नाही.या इब्राहिम आदिलशाहचं चित्र बरेचदा गळ्यात रुद्राक्षांच्या माळा घातलेलं काढलं जात होतं,त्याच्या नाण्यांवरही संस्कृतमध्ये 'दुर्बलांचा रक्षक' असा दावा केलेला होता.अशा प्रकारे त्यानं सर्व समृद्ध हिंदू परंपरांचा स्वीकार केला होता;पण त्याच्या या धोरणावर व्यवहारातले काही परिणामही होत होते.१५६५ साली विजयनगर साम्राज्याचं पतन झाल्यावर मोठ्या संख्येने हिंदू कलाकारांची दैना उडाली,तेव्हा इब्राहिमने आपलं हृदय आणि खजिना त्यांच्यासाठी खुला केला आणि त्यांना विजापुरात आश्रय दिला.त्याच्या नोकरशाहीत मराठी ब्राह्मण तर आधीच मोठमोठ्या पदांवर होते,आता इब्राहिमनं तेलुगू आणि कन्नड व्यावसायिकांना कला,संगीत,वास्तुकला या क्षेत्रांची दारं उघडून दिली.


स्वतः आदिलशाह दरबारात मराठी बोलणं अधिक पसंत करत होता हे बघून एक मुघल राजदूत तर आश्चर्याने थक्कच झाला होता.तसंच त्याच्या जनानखान्यातली आवडती राणीही रंभा नावाची मराठी नर्तिका होती.त्याच्या इराणी पूर्वजांची आणि उत्तरेकडील बादशाहची भाषा फारसी हिच्यापेक्षा इब्राहिमची अधिक पकड संस्कृतवरच होती हेही सर्वज्ञात आहे.


अधिक कट्टर लोकांना आदिलशाहचं हे 'स्थानिक' गोष्टींत रंगून जाणं म्हणजे मुस्लीम धर्माचा विश्वासघात केल्यासारखंच वाटत होतं.कारण केवळ काही पिढ्याच अगोदरचे त्याचे पूर्वज यापेक्षा पूर्णतया वेगळं वर्तन करत होते.ते फारसीला महत्त्व देत होते आणि स्थानिक प्रभावास तावातावाने नाकारत होते.अगदी सैनिकांनाही ते इराणी पद्धतीचे गणवेश घालायला आणि कवायती करायला लावत होते.


त्यामुळे कर्मठ मुस्लीमांकडून येणारी प्रतिक्रिया विजापूरच्या वळणावर येऊनच थांबली होती,यात आश्चर्य तर कसलं? अकबर हा खरा मुस्लीम धर्म पाळत नाही,त्याला तो कमी समजतो असं म्हणणारा बदायुनी उत्तरेला होता,तसंच अदिलशाहला हा फटका कर्मठ मुल्लांकडून नव्हे, तर सूफींकडून बसला.त्याचं असं झालं की एक सूफी अवलिया विजापुरात आला आणि त्याला समजलं की, राजाला हिंदू गाण्याबजावण्याची भुरळ पडली आहे. तेव्हा त्यानं हट्ट धरला की इब्राहिमने अशा देवाला न साजेशा लोकांच्या संगतीतून जाणीवपूर्वक दूर झालं पाहिजे.


तेव्हा सगळ्याच कटकट्या म्हाताऱ्यांना शांत करण्यासाठी तरुण मंडळी जसं म्हणतात की,मी प्रयत्न करतो,तसंच इब्राहिमनंही केलं आणि सरतेशेवटी त्या म्हाताऱ्या सूफी संताला पेन्शन देऊन जहाजाने मक्केला कायमचं पाठवून दिलं. आणखी एका सूफी संतचरित्रात म्हटलंय की आदिलशाहला एका हिंदू योग्याच्या तावडीतून सोडवा असं बऱ्याच लोकांनी त्याला विनंती केली. त्या कहाणीत लिहिलंय,की या कामात तो सूफी संत केवळ आदिलशाहलाच योग्य मार्गात आणण्यात यशस्वी झाला नाही तर त्यानं त्या योग्यालाही धर्मांतर करून मुसलमान बनवलं. या दाव्याची सत्यता संशयास्पद असली,तरी त्यातून चित्र स्पष्ट होतं,ते म्हणजे या राजावर बिगर मुस्लीमांचा भरपूर मोठा प्रभाव होता.त्यामुळे विजापुरातील सामर्थ्यवान गटांना चिंता वाटू लागली होती आणि आग्र्यातील मुघल सम्राटाच्या राजधानीतील लोकांच्याही ते लक्षात येऊ लागलं होतं.आज अकबर आणि 'इब्राहिम द्वितीय' हे राजे आपल्या जगाकडे बघण्यासाठी परतले तर त्यांना त्यांच्यासारखी कुतूहल आणि चैतन्य असलेली बरीच माणसं दिसतील.पण त्यांच्यासारखंच याही काळात त्यांना अशी माणसं दिसतील,जी दुसऱ्यांनी काय विचार करावा,कुणाची आज्ञा पाळावी यात हस्तक्षेप करणारी असतील.

6/16/26

नोकोबी लढाया ! Nokobi battles !

रेव्हरंड वेन लेबो दक्षिण यूएसएतल्या कर्मठ धर्मवाद्यांमधलं बडं प्रस्थ.तो स्वतःला 'गिडियनची तलवार' म्हणवून घेत असे; म्हणजे 'कठोर धर्मसंरक्षक'! तो कोणत्याही औपचारिक धर्मपीठाचा रेव्हरंड नव्हता.त्याचं स्वतःचंच एक पीठ होतं.तो मॉन्रोव्हिलच्या तुरुंगात पहारेकरी होता, आणि त्याला खूष ठेवायला बरेच कैदी 'चर्च ऑफ द इटर्नल रिडीमर'चे सभासद होत असत.रॅफचा वार्ताहर मित्र बिल् रॉबिन्स लेबो आणि त्याचे साथीदार यांच्या बाबतीतला जाणकार होता.

"मी विचारतो आहे,मी कितपत काळजी घेऊ, काळजी करू? ते 'पाखंड्यांना येशू मारेल' प्रकरण मला धोकादायक नाही आहे ना?" रॅफनं विचारलं.

"मी ऐकतो आहे,की तुला जे भाषण दिलं लेबोनं,ते इतरांनाही दिलं आहे.प्राध्यापक,शाळांचे हेडमास्तर, काही राजकारणी वगैरे.तू एकटा नाही आहेस ! पण बहुधा ते सगळं त्याच्या साथीदारांसाठी असतं.तो त्यांना दाखवत असतो,'बघा, कसं घाबरवतो या नास्तिक उदारमतवाल्यांना!" बिल् म्हणाला.

"पण मारामाऱ्या करतात का त्याची माणसं ? पोलिसांना सांगून ठेवायला हवं का मी?"

"आहे काही मारठोकीचा इतिहास.काही जण नाहीसेही झाले आहेत.काही खूनही आहेत.पण आज तरी लेबो आणि त्याच्या गँगवर कोणते आरोप नाहीत.आणि सगळ्या घटना इतर चर्चेस, फुटून निघालेले लोक,वगैरेंच्या आहेत. तुझ्यासारख्या बाहेरच्यांचा संबंध नाही."

सत्तास्पर्धा दिसते आहे!" रॅफ म्हणाला.

"असू शकते.सांभाळून राहा. हवं तर पोलिसांना सांग .. आणि.त्यांना सांगितलं आहेस हे लेबोला सांग ! कुणास ठाऊक ? कोणीतरी लेबोला मारायचा प्रयत्न करत असेल!"

पण मध्ये वेगळंच काहीतरी घडलं.जेप्सन लोकांमध्ये नोकोबी जमीन विकण्यावर एकमत झालं!

लवकरच संडरलंड असोसिएट्सनं नोकोबी पट्टा विकतही घेतला,इतर स्पर्धक बिल्डरांना हटवून. आता संडरलंडच्या अधिकाऱ्यांची एक बैठक झाली,पुढे काय करायचं ते ठरवायला.

"काही अडचणी आहेत,पर्यावरणवाल्यांच्या.त्यांना कमी लेखू नका.ते म्हणताहेत की नोकोबीच्या पश्चिमेचा पट्टा जीव-श्रीमंत आहे." रॅफनं सांगितलं.

"म्हणजे नेमकं काय?" एका उपाध्यक्षानं विचारलं. त्याच्याकडे दुर्लक्ष करून रॅफनं आपला अहवाल सुरू ठेवला.

"त्या पट्ट्यातल्या दोन सॅलामँडर्सच्या जाती, एक पक्षी,एक कासव,सगळे धोक्यातले जीव कायद्यानं संरक्षित आहेत.आणि पिचर प्लँटच्या दोन जाती तर जगात इतर कुठेच सापडत नाहीत.त्या 'एंडेमिक' आहेत, प्रदेशनिष्ठ."

आता उपाध्यक्ष भडकला."सॅलामँडर्स आणि पिचर प्लँट्स ! गेलं सालं आपण आखलेलं गोल्फचं मैदान !"

"इतरही आहे." रॅफ शांतपणे म्हणाला."नोकोबीची लाँग लीफ पाईनची झाडं कापायला परवानगी नाही.आपल्याला वाटलं होतं,की ती झाडं सगळ्या भागात भेटतात,त्यामुळे नोकोबीत ती कापायला परवानगी असेल.पण इथली झाडं मूळची आहेत, 'ओल्ड ग्रोथ' म्हणतात तशी.आणि अशी मूळची झाडं देशभरात फक्त दोन टक्के उरली आहेत, म्हणून ती कापण्यावर बंदी आहे.दहा लाख डॉलरचं लाकूड आहे नोकोबीत,पण कापता नाही येत."

यावर उपाध्यक्षांची फौज,खुद्द ड्रेक संडरलंड वगैरेंनी बरीच चडफड केली.सगळ्यांना देवाची अकरावी आज्ञा पाठ होती,की फायदा कमवायला काहीही केलेलं चालतं.आणि विकासातून फायदा होणार होता.माणसं,त्यांचे रोजगार,दरडोई उत्पन्नात वाढ, या साऱ्यांच्या तुलनेत मूठभर जीवजातींचा अग्रक्रम

खालीच मानत होते,सगळे.उपाध्यक्षानं हा सगळा युक्तिवाद मांडला.तोही इतक्या सुसूत्रपणे,की संडरलंडची मानही डोलू लागली.आता उपाध्यक्षानं शेवटचं हत्यार उपसलं.

"ही देवाची इच्छा आहे." तो गंभीरपणे म्हणाला. "तुम्हाला बायबलमध्ये भेटेल ते.त्यानं आपल्याला पृथ्वीचं राज्य दिलं.बसून आ वासून पाहायला नाही, सुबत्ता वाढवायला,वंश वाढवायला."

रॅफला कधीतरी युक्तिवादात देव येणार हे माहीत होतंच."पटतं मला तुझं,रिक्.पण असाही विचार कर,की लोकांना जीवनाचा दर्जा,जीवनाची गुणवत्ता वाढून हवी असते.नोकोबी पश्चिममध्ये उच्च गुणवत्ता आहे,आज.पण आपण धसमुसळेपणा केला तर वृत्तपत्रं हल्ला करतील.तू बिल् रॉबिन्सचे लेख वाचतोस 'रजिस्टर' मधले ? तो दलदली,मूळ वृक्ष,यांच्यावर फार तिखट लिहितो. उद्या इतर संस्था त्याचं ऐकून त्रास द्यायला लागतील,न्यू सिएरा क्लब्,नेचर काँझर्व्हन्सी, लाँग-लीफ अलायन्स,वाट्टेल ते लोक येतील, आपल्याला माहीतही नसलेले."

रिकूनं हात हवेत उडवले,"इथल्या खूप लोकांना शिकार आवडते.मासे पकडायला आवडतं. कोणत्याही वादात त्यांना माणसांचा विचार आधी करायचा असतो.त्यांना राखीव जंगलं आणि जंगल-खात्याचे पहारेकरी आवडत नाहीत.त्यांच्या मते येशू माणसांचे आत्मे वाचवायला पृथ्वीवर आला,किड्यामकोड्यांसाठी नाही."

रॅफचे डोळे विस्फारले. ही सगळी वाक्यं थेट लेबोशी झालेल्या संभाषणातली होती.

ड्रेक संडरलंड अस्वस्थ होता.प्रेस आणि मीडियाचा विरोध त्रासदायक होता,पण मग काय सारी योजना सोडून द्यायची? छ्याः हा सायरसचा भाचा नको ती खुसपटं काढतो आहे !

"ठीक आहे,रॅफ.तुझा काय सल्ला आहे?"

"ड्रेक --" रिक् बोलायला लागताच संडरलंडनं त्याला हातानं थांबवलं.

रॅफनं त्याच्या ब्रीफकेसमधून एक फाईल काढली. "मिस्टर संडरलंड,रिक् -आपण जरा धोरण बदलून प्रश्न सोडवू शकतो.हे सगळे परिसर आणि मरू घातलेल्या जाती वगैरेंना खर्च न मानता नफ्यात धरू शकतो."

त्यानं तीनतीन पानी काही संच काढले,आणि सगळ्यांना एकेक संच दिला.

"पहिल्या पानावर मी महागड्या वृद्ध लोकांसाठीच्या योजनांमध्ये गेली चाळीसेक वर्षे कसेकसे बदल झाले,ते नोंदवलं आहे.त्यातही आपल्या दक्षिण भागातल्या योजना सुट्या दाखवल्या आहेत.फायदेशीरपणा दोन गोष्टींवर ठरताना दिसतो.एक म्हणजे मोठ्या गावांशी जवळीक,आणि दुसरं म्हणजे योजनेभोवतालचा निसर्ग.श्रीमंत म्हाताऱ्यांना गावं जवळ लागतात, आणि त्यापेक्षाही चहूकडे माणसांचा स्पर्श नसलेला निसर्ग लागतो.या दोन गोष्टी दिल्या,तर दर एकरी नफा सगळ्यात जास्त होतो.

"दुसऱ्या पानावर बऱ्याच जमीन व्यवस्थापन आणि रिअल इस्टेट तज्ज्ञांची मतं आहेत.त्यांनाही माणसाचा हात न लागलेल्या जमिनीची जवळीक नफा वाढवतं,असं वाटतं; अगदी एकमत आहे, त्यावर."

"आणि शेवटी मी आपण काय करावं,याबद्दलची माझी योजना मांडली आहे."

रॅफचा योजनेचा गाभा होता,नोकोबीच्या तीरावर मूठभर छोट्या इस्टेटी घडवणं,हा.प्रत्येक घराला तलावापर्यंत जाता येत होतं.सर्व घरांना एक रस्ता जोडत होता,आणि तो चौक्या बसवून पूर्णपणे खाजगी राखला होता.सगळ्या घरांना बोटींसाठी एकच सामायिक धक्का दिला होता.प्रत्येक घराला एकीकडे तलाव आणि दुसरीकडे राखीव जंगल होतं.मध्यमवर्गाला इथे जागा नव्हती,पण श्रीमंतांना श्रीमंती दरानं घरं देऊन कमी खर्चात मूळ अपेक्षित फायदा कमावता येत होता.

"आणि आणखीन एक बाब पाहा.आपण कोणते धोक्यातले परिसर वाचवले,कोणत्या जीवजाती वाचवल्या,याची भरपूर जाहिरात करू शकतो. नोकोबीला प्रसिद्ध करू शकतो.या राज्यात किती विकास कार्यक्रम असल्या कामाचा दावा करू शकतात ? आणि किती जागी घरांमधून पायी जाऊन अशा जाती पाहता येतात ? आपण गव्हर्नरला बोलावू शकतो,उद्घाटनाला ! भरपूर फोटोज् काढल्यानं तोही खूष.आपण जर या योजनेला वनस्पती उद्यान म्हटलं,तर सांभाळेल सरकार,आणि आपल्याला कर कमी करा असं म्हणता येईल!"

('वारुळ पुराण',माधव गाडगीळ',ई.ओ.विल्सन,अनुवाद - नंदा खरे,मनोविकास प्रकाशन )

"आणि मागे त्या मुंग्या मारण्यानं मिळालेली अप-प्रसिद्धीही मिटवून टाकता येईल!"

अखेर कमी कटकटीत मूळ अपेक्षित नफा,या 'अल्टिमेट सेलिंग पॉइंट'वर रॅफचं म्हणणं संडरलंडनं मान्य केलं.उपाध्यक्ष रिक् मात्र दुखावला गेलाच.

शिल्लक भाग पुढील लेखामध्ये..!!

6/14/26

महत्ता भारतीय वादसंवादाची! / The importance of Indian debate!

'माझ्या नसानसांत भारतीयता भिनलेली आहे. भारताविषयीची माझी दृष्टी भाबडी असता कामा नये. कुठल्याही तर्काच्या कसोटीवर माझे विश्लेषण घासूनपुसून पाहता आले पाहिजे,असा माझा कटाक्ष होता.त्यामुळे एखाद्या पाश्चात्त्याच्या तटस्थपणातून मी भारताकडे पाहू शकलो.कठोर टीकाकाराच्या भूमिकेतून मी भारतीय परंपरेची शक्तिस्थळे आणि दुबळेपणा उमजून घेतला होता.म्हणूनच भारताला आधुनिक रूपडे आणण्याची आस मला लागली होती'.-जवाहरलाल नेहरु ( वाद-संवादप्रिय भारतीय - अमर्त्य सेन ( द ऑर्क्युमेंटेटिव्ह इंडियन,पेंग्विन प्रकाशन,अनुवाद : वाद-संवादप्रिय भारतीय - शारदा साठे मेहता पब्लिशिंग हाउस ) डोळ्यांदेखत एक जण दुसऱ्याच्या पोटात सुरा खुपसतो, रक्ताचे थारोळे साचते.अकरा वर्षांचा कुमार हे सारे भेदरून पाहतो आहे.त्याचे वडील भोसकला गेलेल्याला पाणी पाजतात.

रुग्णालयात घेऊन जातात. मात्र,रुग्णालय त्याला वाचवू शकत नाही,हे दृश्य ते बालक जन्मभर विसरू शकत नाही.त्याला 'मारणारा हिंदू,मरणारा मुस्लीम' असा धार्मिक चश्मा मिळाला नव्हता.जात,धर्म,भाषा,प्रांत ह्या क्षुद्र सीमांच्या पलीकडे पाहण्याची गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांची वैश्विक दृष्टी त्याला लाभली होती.मरणारा बेरोजगार होता. माणसाला काम का मिळत नाही? माणूस जिवे मारायला का व कधी तयार होतो? कठोपनिषदात मृत्यूचे रहस्य उलगडण्याकरिता बालक नचिकेत यमाचा पिच्छा पुरवतो,अशी गोष्ट आहे.त्याप्रमाणे 'हा कुमार' हिंसेचा उगम शोधायला निघाला.१९४२ च्या महाभयंकर दुष्काळाच्या आठवणी त्या बालमनाला दुःस्वप्नासारख्या होत्या.गोदामात धान्याच्या पोत्यांची थप्पी असूनही गोदामाबाहेर हाडांचे सापळे का हिंडतात? याचा 'अर्थ'बोध करून घेण्यासाठी अमर्त्य कुमार सेन झटत राहिला.त्यातून दुष्काळाचे व भुकेचे अर्थशास्त्र जगासमोर आले.टागोर यांच्या मानवतावादी विचारांचा विस्तार अमर्त्य सेन यांनी केला.मध्ययुगात रुतलेल्या सुस्त भारताला आधुनिकतेकडे खेचून आणणारा रथ गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी तयार केला.महात्मा गांधी आणि आणि पं.नेहरू यांनी तो रथ ओढणाऱ्या अनेक पिढ्या घडवल्या.

प्राचीन काळापासून पौर्वात्य व पाश्चात्त्य विचार,नवता व परंपरा,निसर्ग व मानव,व्यक्ती व समाज,बुद्धी व भावना अशी अनेक द्वंद्वं चालत आली आहेत.त्यांच्यात अद्वैत साधण्याची किमया टागोर,गांधी व नेहरू यांनी साधली. विक्रम साराभाई,

सत्यजित राय,लॉरी बेकर,अमर्त्य सेन यांसारख्यानी त्यांचा वारसा प्रगल्भ करून आधुनिकता रुजवण्याचे कार्य केले.टिकवून धरावी अशी भारतीय परंपरा कोणती?भारताने नवतेमधील कशाचा स्वीकार करावा? परंपरा आणि आधुनिकता यांचा उत्तम संगम कसा घडवावा? याचा सखोल आणि चिकित्सक मागोवा घेऊन टागोर,गांधी व नेहरू याँनी विचार आणि कृती दिली.त्यासाठी आवश्यक लोकशाही मूल्यांना आधार देणाऱ्या संस्थांची रचना केली.भारतीय लोकशाहीने पंचाहत्तर वर्षांत केलेल्या प्रगतीचा पाया या तिघांनी घातला,याचा विसर पाडणे कृतघ्नपणाचे ठरेल.काळाच्या ओघात कुठलाही बदल घडवण्यात अग्रभागी राहणाऱ्या मध्यमवर्गाची संवेदनशीलता नाहीशी होत गेली.इतरेजनांबद्दल तुच्छता व मग्रुरी हे मध्यमवर्गीयांचे व्यवच्छेदक लक्षण ठरू लागले.पैसा कमावणारा यंत्रवत व आत्ममग्न समाज पाहून १९९१मध्ये सत्यजित राय यांना सुसंस्कृतता (व ते स्वतः) 'आगंतुक' असल्याची

खात्री वाढू लागली.१९९२ मध्ये जर्मनीला विभागणारी बर्लिन भिंत पाडण्यात आली.

जग एकवटण्याची सुरुवात झाली.' त्याच वर्षी तालिबानी काश्मीरमध्ये घुसले आणि हिंसाचार सुरू केला इकडे बाबरी मशीद उद्ध्वस्त झाली.सार्वजनिक जीवनात भौतिक समस्यांपेक्षा धार्मिक व जातीय मुद्द्यांना अधिक महत्त्व येत गेले.अनेक संघटना संपुष्टात येऊ लागल्या.हिंदू-मुस्लीम,सवर्ण-दलित यांच्यात सेतू साधणारे कार्यक्रम दिसेनासे झाले.समाजातील संवाद नाहीसा होऊ लागला.कधीही उद्रेक होऊ शकेल अशी ज्वालाग्राही परिस्थिती अनेक ठिकाणी दिसू लागली.

भारतापुढे भविष्यात काय वाढून ठेवलं आहे? दारिद्र्य व विषमतेच्या पर्यावरणातील अशांतपर्वातून आपण कसे बाहेर पडणार? प्रादेशिक अस्मिता वरचढ ठरून देशाचे तुकडे पडतील?अशा अनकेविध कूटप्रश्नांनी ग्रासलेल्या भारताने विचार कसा करावा? भारतामधील सामाजिक,सांस्कृतिक,राजकीय घडामोडींमुळे अस्वस्थ होऊन अर्थतत्त्वज्ञ डॉ.अमर्त्य सेन भारताच्या भवितव्याबाबत सातत्याने चिंतन करीत आहेत.ते आपल्या व्याख्यानांतून व निबंधांतून त्यांचे विचार आपल्यापर्यंत पोहोचवत असतात. 'द ऑर्क्युमेंटेटिव्ह इंडियन' ह्या ग्रंथातून डॉ.अमर्त्य सेन यांनी भारतीय इतिहास आणि संस्कृतीमधील सार्वकालिक विचारांचे सत्व आपल्याला काढून दिले आहे.स्त्रिया व कष्टकरी चळवळीमधील ज्येष्ठ कार्यकर्त्या श्रीमती शारदा साठे यांनी 'वाद-संवादप्रिय भारतीय' हा या मौलिक ग्रंथाचा अनुवाद, मराठी वाचकांना उपलब्ध करून दिला आहे.अमर्त्य सेन यांनी प्रस्तुत ग्रंथामध्ये 'अभिव्यक्ती आणि बहुविधता','संस्कृती आणि परस्परसंवाद',

'राजकारण आणि निषेध','बुद्धिप्रामाण्य आणि ओळख' अशा चार भागांतील प्रत्येकी चार प्रकरणांमधून सविस्तर व सखोल मांडणी केली आहे.'वाद-संवादातून चातुर्य येते', या सुभाषिताची प्रचिती भारतीय इतिहासात वारंवार येते.वेद- उपनिषदांचा काळ असो वा रामायण-महाभारताचा काळ असो;मंडण व खंडण हा सार्वजनिक जीवनाचा अविभाज्य घटक होता. सार्वजनिक वादविवादांमध्ये जातिभेद वा लिंगभेद नव्हता.प्रत्येकाला मोकळेपणाने विचार मांडण्याची मुभा होती.भारतीय युक्तिवादाची परंपरा ही कोणाचीही मक्तेदारी

( १ 'आगंतुक' हा सत्यजित रे यांचा शेवटचा चित्रपट. १९९२ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात रे यांनी तथाकथित सभ्यता व सुसंस्कृततेला प्रश्न विचारले आहेत.

२ दुसऱ्या महायुद्धानंतर विचारसरणींच्या आधारावर जर्मनीची पूर्व व पश्चिम अशी फाळणी झाली.पश्चिम जर्मनीने लोकशाही भांडवलवादाच्या तत्त्वावर वाटचाल केली,तर पूर्व जर्मनीने साम्यवादी (कम्युनिझम) तत्त्वावर.साम्यवादी सोव्हिएत रशियाचे पतन झाल्यानंतर १९९२ मध्ये जर्मनीचे पुन्हा एकीकरण होऊन तिथे लोकशाही भांडवलवाद रूढ झाला.)

नव्हती.आद्य शंकराचार्यांना विचार करण्यास भाग पाडणारा चांडाळ होता.रामायणात रामावर कडाडून टीका करणारा नाबाली होता.याज्ञवल्क्य ऋषीला विदुषी गार्गी धर्मशाखातील कूटप्रश्न विचारते.

द्रौपदीने केलेल्या प्रश्नांच्या भडिमारापुढे धृतराष्ट्र,

विदुर,भीष्माचार्य दिङ्गुढ होतात.इतकेच काय,जेव्हा रक्तरंजित युद्ध करण्यापेक्षा सत्तेचा त्याग उत्तम असा पर्याय युधिष्ठिर निवडतो, त्या वेळी द्रौपदी म्हणते,'आपण राजाधिराज इंद्राप्रमाणे शूर आहात.अवघ्या पृथ्वीवर आपण प्रदीर्घ काळ राज्य केले आहे.आता आपल्याच हाताने ते राज्य भिरकावून देत आहात.

आपल्याला शौर्य कर्म करावयाचे नसेल,तर क्षत्रियाचे प्रतीक असलेले हे धनुष्य द्या फेकून! केसांची वेणी करून घ्या.मग खुशाल आयुष्यभर पवित्र अग्ग्रीला आहुती देत बसा.' हा द्रौपदीचा युधिष्ठिराशी संवाद केवळ भावनिक नाही.समर्पक उपमा,रूपक यांची पखरण करीत केलेली ती तर्कशुद्ध मांडणी होती.पुढे युद्धभूमीवर कृष्ण व अर्जुन यांच्यातील प्रदीर्घ संवाद गीतेमधून व्यक्त झाला आहे तात्त्विक व नैतिक प्रश्नांमुळे अर्जुन विषण्ण झाला होता.त्याच्या सर्व शंका व संशय नाहीसे करून त्याने युद्धास सिद्ध होईपर्यंत कृष्णाने केलेले तर्कशुद्ध संभाषण गीतेच्या अध्यायांतून आढळते.

'महापुरुष असो वा ग्रंथ;कोणाचेही प्रतिपादन हे अंतिम प्रमाण मानू नका.बुद्धीस पटले तरच त्याचा स्वीकार करा.' हा संदेश हीच भारतीय विचारपरंपरेची अमूल्य देणगी आहे,याचे अनेक दाखले अमर्त्य सेन देतात. प्राचीन भारतात धार्मिक कर्मठपणाला समाजातील कनिष्ठ वर्गांकडून सतत आव्हाने दिली गेली. जातिव्यवस्था घडत गेली,तेव्हा श्रेष्ठत्वाच्या उतरंडीवर घणाघाती हल्ले झाले आहेत.भृगू ऋषी भारद्वाजांना विचारतात,'आपण सारी ईश्वराची लेकरे आहोत,तर मुलांचे वर्ण भिन्न कसे असू शकतील?' यक्ष व कूटप्रश्नांच्या आधारे तर्काच्या कसोटीवर प्रत्येक बाब तपासून पाहणे,शंका व संशय घेणे ही प्राचीन भारतामधील सहज प्रवृत्ती झाली होती. 'बाबा वाक्यं प्रमाणं' मानणाऱ्यांना भारतीय इतिहासात प्रतिष्ठा नव्हती.त्यातूनच चार्वाकांचा नास्तिकतावाद विस्तारत गेला. 'मृगजळाप्रमाणे इंद्रियांस कधी भास होऊ शकतात.धूर असेल तर आग असण्याची शक्यता असते, एवढेच सांगता येते.'असे लोकायत दर्शन सांगते.कनिष्ठ जातींना मिळणारी वागणूक सहन न झाल्यामुळेच बौद्ध व जैन धर्माची स्थापना झाली. त्या काळात वाद-संवादांमुळे मतांतरे व त्यातून धर्मांतरे झाली आहेत.सामाजिक भेदभावाचा धिक्कार करणाऱ्या हिंदू भक्ती पंथ,तसेच मुस्लीम सूफी पंथ यांचा सहज प्रसार मनपरिवर्तनामुळेच झाला होता.सहिष्णुता व सौहार्दाचे वातावरण तयार करण्यात ऐतिहासिक भूमिका बजावणारे सम्राट अशोक,अकबर हे हिंदू नव्हते.विणकर कबीर,चर्मकार रविदास,सेना न्हावी, नरहरी सोनार हे कवी; तर मीराबाई.मुक्ताबाई,दयाबाई, अंदलबाई,

सहजोबाई ह्या कवयित्रींच्या भजनांची समाजमनावर छाप अजूनही आहे. विचारमंथनाची प्रक्रिया खोलवर रूजल्यामुळे समाजातील सर्व थरातून अभिव्यक्तीचा तो अविष्कार होता.इसवी सन १००० सालार्यंत अवघ्या जगावर भारतीय विज्ञान,तत्त्वज्ञान आणि गणित यांचा दबदबा निर्माण झाला होता. त्याचा पाया हा बहुविधतेच्या ऐतिहासिक परंपरेने रचला होता.

वाद-संवाद परंपरांमुळे भारतीय उपखंडातील सामाजिक व सांस्कृतिक जगाची जडणघडण होत गेली.त्यामुळेच बहुविधता हा आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक झाला आहे.भारतीय लोकशाही ही ब्रिटिशांच्या प्रभावाची निष्पत्ती असल्याची ग्वाही अनेक स्वयंघोषित बुद्धिवादी देतात.अतिप्राचीन काळापासून चालत आलेल्या वाद-संवाद परंपरांमुळे आपल्या लोकशाहीची पाळेमुळे खोल रुजली आहेत,हा इतिहास त्यांना माहीत नसतो.

असे नसते तर ब्रिटिश साम्राज्याच्या आधिपत्यापासून मुक्त झालेल्या शंभर राष्ट्रांमध्ये लोकशाही सारखीच दिसली असती,असा बिनतोड युक्तिवाद सेन करतात.

प्राचीन भारतामध्ये कालगणना करण्यासाठी सात प्रकारच्या दिनदर्शिका उपलब्ध होत्या.खगोलशास्त्र व गणिताचा गाढा अभ्यास असल्याशिवाय दिनदर्शिका तयार करता येत नाही.इसवी सन पूर्व ३१०२ मध्ये कलियुग कालगणना पद्धतीचा आरंभ झाला.त्यामधील अचूक गणितीपद्धतीच्या नोंदी पाहून आज कुणीही थक्क होईल.चार लक्ष बत्तीस हजार वर्षांचे कलियुग हे चार युगांतील सर्वांत लहान युग आहे.कृतयुग हे कलियुगाच्या चौपट,द्वापारयुग हे तिप्पट,तर त्रेतायुग हे कलियुगाच्या दुप्पट होते.'कलियुग दिनदर्शिकेमधून त्या काळातील ग्रहताऱ्यांची अचूक स्थिती लक्षात येते',असा गौरव गणितज्ञ लाप्लेस यांनी केला होता.सेन यांनी बुद्धनिर्वाण,महावीरनिर्वाण शक,बंगाली व कोल्लम यांसारख्या इतर दिनदर्शिकांचा अभ्यास करून त्यांच्यामधील विविधता आणि एकतेकडे लक्ष वेधले आहे.

इतिहासाची महत्ता सांगताना सेन वर्तमानातील भारताच्या समस्यांबाबत चिंता व्यक्त करतात. जागरूक मतदारांना धार्मिक अस्मितेपेक्षा भूक, रोजगार, शिक्षण, आरोग्य हेच प्रश्न महत्त्वाचे वाटतात, याकडे ते वाचकांचे लक्ष वेधतात.

इतिहासाची महत्ता सांगतानाच सेन वर्तमानाकडे येतात. केवळ संख्यांचा आधार घेऊन भारताला हिंदुत्ववादी ठरवण्याच्या विकृत खटाटोपाचा खरमरीत समाचार घेतात 'कडव्या हिंदुत्वाचा पुरस्कार करणाऱ्या राजकीय पक्षांना स्वातंत्र्य चळवळीपासून आजतागायत कधीही जनाधार मिळालेला नाही.आजही भारतीय जनता पक्षाला ३० टक्क्यांपेक्षा अधिक मते मिळू शकत नाहीत.बाबरी मशीद उद्ध्वस्त करणे,गुजरातमध्ये मुस्लिमांवर निर्घण अत्याचार करणे,असे हिंसाचार करून धर्माच्या पायावर राजकीय फायदा उठवता येत नाही.जागरूक मतदारांना धार्मिक अस्मितेपेक्षा भूक, रोजगार,शिक्षण,आरोग्य हेच प्रश्न महत्त्वाचे वाटतात,हे अनेक निवडणुकांमधून व्यक्त झाले आहे.हेच भारताचे वैशिष्ट्य आहे.' असे ते म्हणतात.भारत व चीन यांच्यात व्यापारी संबंध पूर्वापार चालत आले आहेत.बौद्ध धर्मामुळे देवाणघेवाण वाढत गेली. पहिल्या सहस्रकात भारतीय विद्यापीठात शिक्षण घेण्यासाठी चिनी विद्वान मोठ्या संख्येने येत असत. चिनी प्रवाशांनी,तसेच विद्वानांनी भारतीय शिक्षण व आरोग्यव्यवस्थेला आदर्श म्हटले आहे.

हा इतिहास रम्य वाटला,तरी वर्तमानात भारताची शिक्षण व आरोग्य क्षेत्रातील अवस्था दयनीय आहे.शिक्षणाचा प्रसार आणि उत्तम सार्वजनिक आरोग्य यांच्यामुळे जागतिकीकरणानंतर चीनला आंतरराष्ट्रीय व्यापारात हनुमान उडी घेता आली.निर्यात होणाऱ्या वस्तूंचे उत्पादन करण्याकरिता चीनमध्ये कामगारांना प्रशिक्षित केले जाते.जागतिक बाजारपेठेत उतरायचे असेल,तर गुणवत्ता उच्च दर्जाची असावी लागते.अनुरूप शिक्षण व चांगले आरोग्य असल्यास उत्पादन व सेवा यांचा दर्जा टिकून राहतो.जागतिक बाजारपेठेत चीनने स्थान मिळवताच तिथे नोकऱ्या वाढू लागल्या.या विकासप्रक्रियेपासून भारताने बोध घेतला पाहिजे,असे आग्रही प्रतिपादन अमर्त्य सेन करतात.

'राजकीय समानता आली,तरी सामजिक व आर्थिक विषमतेमध्ये भारतीय लोकशाही आयुष्य कंठणार आहे.' १९५०मध्ये डॉ.आंबेडकरांनी प्रजासत्ताकावर केलेले मार्मिक भाष्य आजदेखील तंतोतंत लागू पडते. 

१९४३ नंतर दुष्काळामुळे भूकबळी झाले नाहीत,याचे श्रेय भारतीय लोकशाहीला आहे.गेल्या पंचाहत्तर वर्षांत आयुष्यमान व दरडोई उत्पन्न वाढले.तरीदेखील आपल्याला अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. काही महानगरांमधील मोजक्या लोकांभोवती जागतिकीकरणाचा फायदा एकवटला आहे. 'विषम संधी हा आपल्या लोकशाहीवर लागलेला कलंक आहे. निरक्षरता,अनारोग्य,अपूर्ण जमीन सुधारणा व शेतीविकासाची उपेक्षा अशीच चालू राहिली,तर अशांतता व असुरक्षिततेमुळे लोकशाही धोक्यात येऊ शकते.' हे प्रखर वास्तव सेन अधोरेखित करतात. त्याचबरोबर ते उपाययोजनादेखील सुचवतात.प्राथमिक शिक्षणाच्या व्यवस्थापनाची पुनर्रचना करावी, शाळेच्या व्यवस्थापनात वंचित समाजगटाच्या पालकांचा समावेश करावा,अशा अनेक धोरणात्मक सूचना ते करतात.

महाभयंकर हिंसा आणि पर्यावरण विनाश यांमुळे सध्या जग अंधारून गेले आहे.तर्क वा युक्तीने संवाद साधता येण्याची क्षमता नसणारे निर्बुद्ध लोक बळाच्या आधारे मत लादू पाहतात.असे लोक सर्व काळात,सर्व धर्मांत व पंथांत असतात.लोकशाही व समाजस्वास्थ्य धोक्यात येण्याचे प्रसंग राष्ट्राच्या आयुष्यात येत असतात. 

आज समस्त जनता हवालदिल झाली असून,हे भीषण वातावरण त्यांना नकोसे झाले आहे.जनता तिच्या विविध पद्धतीने भावना व्यक्त करीत आहे आणि हीच आशा आहे.बदल व्हावा ही अभिव्यक्ती महत्त्वाची असते.त्यातूनच युक्तिवाद व वाद-संवाद झडू लागतात. मोठ्या परिवर्तनाची ती नांदी असते.काळ्याकुट्ट ढगांनी दाटी केली,तरी काही क्षणांत रुपेरी कड अवतरते आणि आसमंत उजळून जातो.निरंतर सुरू राहिलेल्या वाद-संवाद परंपरेने भारतावरील अनेक सावटे दूर केली आहेत.त्यामुळेच वाद-संवाद परंपरा हीच भारतीयत्वाची ओळख आहे,हे सेन साधार दाखवून देतात.एकविसाव्या शतकातील भारतात १००० पुरुषांमागे ९३० स्त्रिया आहेत.आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने गर्भाचे लिंग जाणून घेतल्यावर मुलींचा नाश करण्याचे प्रमाण वाढत आहे.१९८६ मध्ये जगभरातील १० कोटी बालिकांना 'गायब' करून टाकले गेले.या वास्तवाने सेन दुःखी होतात.पंजाब,

हरियाणा,गुजरात व महाराष्ट्र ही राज्ये त्यात आघाडीवर आहेत.त्यामानाने पूर्व व दक्षिणेकडील राज्यांत परिस्थिती बरी आहे. हा लिंगभेद समाजस्वास्थ्य बिघडवून टाकणारा आहे.मातांचे मोठ्या प्रमाणावर कुपोषण होते.त्यामुळे कमी वजन व आजार घेऊनच बालकांचा जन्म होतो.पुढे बालपणातील कुपोषणामुळे अनेक व्याधी जडतात.यापासून सुटका झाली असेल,तर शिक्षण,नोकरी,व्यवसाय,संशोधन, राजकारण सर्वच क्षेत्रांत स्त्रियांना मिळणाऱ्या सुविधांपासूनच विषमता सुरू होते.

गुणवत्ता असूनही महिलांना संधी नाकारण्याची मानसिकता आजही तेवढीच आक्रमक आहे.त्यामध्ये गरीब व श्रीमंत असा वर्गभेद करता येत नाही.अमेरिकेत दरवर्षी १५ लाख महिलांवर बलात्कार होतात,याकडे सेन लक्ष वेधतात.आपली संस्कृतीची वैशिष्ट्ये कोणती? इतिहास कसा वाचावा? यांचा वस्तुपाठ प्रस्तुत ग्रंथ देतो. भूतकाळाचे भान व वर्तमानासाठी कृतिआराखडा सेन सादर करतात.

समाप्त...