* विजय गायकवाड | Vijay Gaikawad

live

नमस्कार आपले स्वागत आहे. मी पुस्तके आणि मित्रांवर पैसे खर्च करतो,माझ्याकडे दगड आणि विटांवर खर्च करण्यासाठी पैसे नाहीत.- रस्किन बाँड.ही थोर माणसं व त्यांचे विचार मला पुस्तकात भेटलीत.ती भेटली आणि त्यांनी सांगितले कि, प्रत्येक दिवशी असं काही तरी करा की,ते तुम्हाला अधिक सुंदर उद्याच्या दिशेने खूप लांबवर घेऊन जाईल."- डोग फायरबाऊ.' सर्वियन कादंबरीकार मिलोराद पावीच यांचे एक वाक्य आहे ते म्हणतात - जोवर जगात पुस्तक वाचणाऱ्या वाचकांची संख्या बंदूकधारी सैनिका पेक्षा अधिक आहे तोवर काळजीच काहीच कारण नाही.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात.पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये.म्हणून अविरतपणे प्रयत्न करणारे मार्गदर्शक, मित्र धावून येतात.प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,डॉ.दीपक शेटे,आ.भरत बुटाले,प्रा.सर्जेराव राऊत,सुभाष ढगे,अनिल फारणे,डॉ.सुधीर सरवदे ,विश्वास खाडे, विनायक पाटील,संजय कुंभार,सतीश खाडे,मनोहर सुर्वे,गणेश खंदारे,तात्या गाडेकर, दादासाहेब गाडेकर, दादासाहेब ताजणे, पुस्तकातील घटना प्रसंग सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील यांनी केलेले आहे. मला लिहिण्याची प्रेरणा देणारी पुस्तके,लेखक,प्रकाशक,मित्र ही जगावेगळी माणसं माझ्या जीवनातील महत्वाचा टप्पा आहेत.... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ.मेघा गायकवाड, चिरंजीव मयान,माझ्या धावण्यातील गुरुवर्य नामदेव बरुरे,लुल्ला शेख मोठी ताई ,लहान ताई जयश्री शिंदे या सर्वांचेच मनापासून आभार व धन्यवाद मॅट्रिक फेल विजय गायकवाड

२०/२/२६

इन्द्राची नीतिमूल्ये / Indra's ethical values

जशी एका समाजांतर्गत एकतर्फी देवाण-घेवाण पोसली गेली,तशीच वेगवेगळ्या समाजांतील व्यक्तींकडून दुसऱ्या समाजाचे शोषणही पोसले गेले.इजिप्तच्या नाईल नदीप्रमाणेच भारतात सिंधू नदीच्या खोऱ्यात हडाप्पा,मोहेंजोदाडो,लोथाल ह्या नगरांच्या आसपास अशाच सुपीक शेतीच्या अतिरिक्त उत्पादनाच्या आधारे मोठ्या प्रमाणावर श्रमविभागणी झालेली समाजव्यवस्था अस्तित्वात आली. 


ह्या संस्कृतीचा व्यापार अरबस्थानापर्यंत पसरला होता. ह्या व्यापाऱ्यांचा जमाखर्च नोंदवण्यासाठी एक लिपी पण वापरात आली,पण आजतागायत तिचा अर्थ लावता आलेला नाही,त्यामुळे ह्या संस्कृतीबद्दल आपली माहिती फार तुटपुंजी आहे.इजिप्तमध्ये पिरामिड बांधत होते त्या काळात,चार पाच हजार वर्षांपूर्वी ही संस्कृती भरभराटीला आली होती.सुमारे दीड हजार वर्षांपूर्वी ती खालावत खालावत लयाला गेली.ऱ्हासाला पर्जन्यमानात झालेली घट व त्यामुळे घटलेले अतिरिक्त कृषि उत्पादन जबाबदार होते असा एक अंदाज आहे. पण आणखी एक सुचवले गेले आहे की,मध्य आशियातून आलेल्या वैदिक संस्कृतीच्या लोकांच्या आक्रमणाने मोहेंजोदाडो संस्कृती उद्ध्वस्त झाली. 

'वारुळ पुराण',माधव गाडगीळ',ई.ओ.विल्सन,अनुवाद - नंदा खरे,मनोविकास प्रकाशन ) हे समाज प्रामुख्याने पशुपालक समाज होते. त्यांच्यापाशी घोडे होते,लोखंडी हत्यारे होती.त्यांच्या बळावर त्यांनी शेतीप्रधान,स्थिर समाजांवर कुरघोडी केली.अशा युद्धांत दया-माया न बाळगणारे यशस्वी होतात.वैदिक समाजाचा एक नेता होता,इन्द्र.तो असाच निर्दय होता असे दाखवले गेले आहे.इन्द्राचे दुसरे नाव आहे पुरंदर,अथवा शहरे उद्ध्वस्त करणारा.त्याने मोहेंजोदाडो संस्कृती पुरी नष्ट केली अशीही एक शक्यता वर्तवली जाते.


प्रत्येक माणसाच्या अंतर्मनात काही प्रमाणात तरी स्वार्थ आणि परोपकार,हिंसा आणि करुणा,क्रौर्य आणि दया-क्षमा-शांती,

खोटेपणा आणि सच्चेपणा ह्यांच्यात रस्सीखेच,कुतरओढ चालू असते.समाजातही ह्या परस्परविरोधी प्रवृत्तींची स्पर्धा,ह्यांचे द्वंद्व पाहायला मिळते.इन्द्र आणि प्रतर्दनाचा एक संवाद ह्या द्वंद्वाचे चित्रण करतो.दिवोदासाचा पुत्र प्रतर्दन युद्ध करून आणि पराक्रम दाखवून इन्द्राच्या आवडत्या वाड्यांत गेला.त्याला इन्द्र म्हणाला,"हे प्रतर्दना,तुला मी वर देतो." प्रतर्दन म्हणाला, "जो मनुष्याला कल्याणकारक होईल असा वर दे." इन्द्र उत्तरला,"वर दुसऱ्याकरतां घेत नसतात.स्वतःसाठी वर मागून घे." प्रतर्दन "माझ्यासाठी मला वर नको." तेव्हा इन्द्राने सत्य गोष्ट सांगितली. कारण इन्द्र सत्य आहे.तो म्हणाला, "मला जाण.तेच मनुष्याला हितकारक आहे की जेणेकरून मला तो जाणेल.त्वष्ट्याच्या मुलाला त्रिशीर्षाला मी ठार मारले. अरुर्भग नावाच्या यतींना कुत्र्यांकडून खाववले. पुष्कळ तहांचे अतिक्रमण करून दिव्यलोकी प्रल्हादाच्या अनुयायांना,अंतरिक्षांत पौलोमांना आणि पृथ्वीवर कालकाश्यांना मी ठार मारले.त्या प्रसंगी माझा एक लोम देखील वाकला नाही.अशा प्रकारे जो मला ओळखील,त्याने मातृवध,पितृवध,चौर्य,भ्रूणहत्या इत्यादी पापे केली असता किंवा तो करीत असता त्याला भीती वाटणार नाही,किंवा त्याच्या तोंडाचा नूर पालटणार नाही."


खांडववन दहन


इन्द्रकाली,सुमारे तीन हजार पाचशे वर्षांपूर्वी वैदिक संस्कृतीतले समाज सिंधू नदीच्या खोऱ्यात पोचले असावे.हळूहळू पसरत जाऊन महाभारत काली,सुमारे तीन हजार वर्षांपूर्वी ते यमुनातीरी पोचले.गुरे-ढोरे बाळगणाऱ्या,नांगराने शेती करणाऱ्या तथाकथित आर्य जमातींच्या इतिहासात वने जाळण्याच्या कापण्याच्या अनेक घटना आढळतात.महाभारतातील राज्ये लहान होती.एक राजधानी,सभोवती शेती असलेली खेडी व त्याभोवती अरण्य असे राज्यांचे स्वरूप होते.पण ही अरण्ये म्हणजे कोणाचीच मालकी नाही अशी भूमी नव्हती.मोहासारख्या वनोपजावर,

शिकारीवर,कुदळीने खणून फिरती शेती करण्यावर जगणारे तिथल्या रहिवासी नागांचे परिवार अशी वने जाळण्याला विरोध करत होते.रान जाळणे व शेतकऱ्यांना ते वसाहतीला देणे हे राजाच्या कर्तव्यांपैकी एक होते.तेच कृष्णा -अर्जुनांनी केले.असे रान जाळून वसाहतीला द्यायचे असेल तर त्या जमिनीला कोणी मालक असता कामा नये,म्हणून त्या भूमीत वंशपरंपरा राहणाऱ्या सर्वांचा संहार केला.


कृष्ण व अर्जुन यमुनेकाठी मजेत वनविहार करावयाला गेले असताना अरण्य जाळण्याची कल्पना निघालीच का? महाभारत सांगते की अग्नी ब्राह्मणाचे रूप घेऊन आला आणि त्याने खाद्य मागितले.ब्राह्मणाला नाही कसे म्हणणार म्हणून खांडव जाळले.

जाळले ते कसे? तर दोघांनी दोन बाजूने रथ व धनुष्यबाण असे चालवले की, एकाही प्राण्याला बाहेर निघता येऊ नये,


नागराज तक्षक कुरुक्षेत्राला गेला होता म्हणून वाचला.त्याचा मुलगा मोठ्या युक्तीने स्वत:चा प्राण देऊन आईने वाचवला.

तक्षकाच्या घराण्यातील इतर सर्व मारले गेले.खांडव वन दहनात कुठल्याच तऱ्हेचे विधिनियम दिसत नाहीत.नागांचा संहार हेच एक उद्दिष्ट दिसते.अर्जुन क्षत्रिय होता.क्षत्रियाचे ब्रीद बरोबरीच्यांशी युद्ध,क्षत्रियाचे ब्रीद शरणागताचे रक्षण,क्षत्रियाचे ब्रीद कोणाचा तळतळाट न घेणे.

अर्जुन विराटपर्वात सांगतो : मी लढत असताना कधीही बीभत्स कृत्य करत नाही. मग त्याने खांडव वन का जाळले? आतील सर्व प्राणी, पक्षी,एवढेच नाही तर स्त्रिया मुलांसकट नागपरिवार निःशेष का मारले?असे दिसते की शरणागताचे रक्षण, बरोबरीच्याशी युद्ध करणे हे क्षत्रियांचे नियम स्वतःच्या समाजापुरते होते.ते परकीयांना लागू पडत नव्हते.

एकोणिसाव्या शतकात गोऱ्या लोकांनी दक्षिण अमेरिकेतील अर्जेन्टीनातील,ऑस्ट्रेलियन खंडाच्या टास्मानिया बेटावरील आदिवासींची जनावरांची करावी तशी शिकार केली,असा अगदी ताजा इतिहास आहे.त्याच शतकात त्याच गोऱ्या लोकांनी भारत पादाक्रांत केल्यावर कायद्यांच्या आधारे अरण्यभूमीत वंशपरंपरा राहणाऱ्या अनेक आदिवासीयांचे सर्व हक्क हिरावून घेतले.एका दिवसात त्यांचे पिढ्यान् पिढ्यांचे उपजीविकेचे मार्ग हे अपराध ठरवले.मग त्यांना वेठबिगारीला लावले.दूरदूरच्या चहाच्या मळ्यांत जायला लावून तेथे गुलामांसारखे वागवले.


रेमंड डास्मान या परिसरशास्त्रज्ञाने प्राधान्याने स्वतःच्या पंचक्रोशीतील निसर्गसंपत्तीवर गुजराण करणाऱ्या मानव समाजांना परिजन अथवा ecosystem people, केवळ वस्तीच्या आसमंतातील संसाधनेच उपलब्ध न राहता दूर दुरून आणलेली संसाधने वापरणाऱ्या मानव समाजांना ऊर्वीजन अथवा biosphere people असे नामाभिधान सुचवले आहे.रामचंद्र गुहा आणि मी सुचवतो की मानव - निसर्ग ह्यांच्या परस्परसंबंधांचा विचार करता एक तिसरा वर्ग संभावतो;तो म्हणजे आसमंतातील संसाधनांपासून ज्यांची जबरदस्तीने, बळजबरीने फारकत झालेली आहे असे लोक- परिविस्थापित अथवा eco logical refugees. खांडव वन जाळले तेव्हा असा परिविस्थापित झालेला 


नाग त्या वेळी तक्षकाच्या घरी पाहुणा म्हणून आलेला. एक असुर,मयासुर,कृष्ण ह्यालाही मारू इच्छित होता,पण अर्जुनाने त्याला अभयदान दिले.मय हा उत्तम शिल्पशास्त्री होता.जीवदानासाठी कृतज्ञता व्यक्त करत त्याने युधिष्ठिराला मयसभा बांधून दिली. अशा वास्तूंचे मुख्य उद्दिष्ट असते आपला दिमाख मिरवणे.एका दृष्टीने हे पूर्णपणे सफल झाले,आणि मयसभेचा भपका बघून कौरवांच्या मनात जो मत्सर निर्माण झाला,त्यातून महाभारताचे युद्ध घडून आले.


जगात सर्वत्रच फैलावत असलेल्या बलिष्ठ समाजांनी ते जिथे पसरत होते,त्या मुलखात आधी राहणाऱ्या समाजांना एक तर नष्ट केले,वेगळे ठेवत अंकित केले, किंवा सामावून घेतले. कृष्ण-अर्जुनांनी नागांना समूळ नष्ट करण्याचा प्रयत्न केला.पण ह्या जोडीलाच वेगवेगळे समाज एकत्र येऊन त्यांचे मिश्रणही होऊ लागले. अर्जुनानेच नागकन्या उलूपीशी विवाह केला.भीमाने असुरांच्यातल्या हिडिंबेशी.परंतु पूर्ण वंशच्छेद अथवा सामावून जाणे ह्याहूनही जास्त प्रमाणात भारतीय समाजात ज्यांच्यावर वर्चस्व प्रस्थापित केले अशा समाजांना वेगळे ठेवून,त्यांच्याशी रक्तसंबंध टाळून खालच्या पातळीवरच्या जाती - पोटजाती घडवण्यात आल्या असे दिसते.अशा जाती-जातींत संकर होणे अनिष्ट अशी विचारधारा उद्भवली.महाभारत युद्धाच्या आरंभी अर्जुन कृष्णाला स्पष्टच म्हणतो,वर्णसंकरातून अनर्थ उद्भवतो : तैसा कुळी क्षयो होये। तेव्हळि आदि धर्म जाए। मग आन काही आहे। पापावांचौनि।। जै यमनियम ठाकवि। तें इंद्रियें सैरा विचरति। म्हणौनि व्यभिचार घडती। कुळचियं ।। उत्तम अघमी संचरति। वर्णावर्ण मिसळति। तेथ समूळ उपडति। जातिधर्म।। जैसें चौदष्टांचेया बळी। पावति मेरा काढली। महापापे कुव्छि। प्रविशति ।।


भारताबाहेरील समाजात मात्र अमे वर्णसंकट, जातिसंकट टाळले पाहिजेत अशी रचना रुजली नाही. चीनमध्ये राज्यातले प्रशासक मॅन्डारिन हा प्रतिष्ठितांचा कंपू समाजाच्या सर्व थरातून स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून निवडला जाई.मध्ययुगीन युरोपात विद्यापीठांच्या माध्यमांतून समाजाच्या वेगवेगळ्या थरांतून लोक विद्वत्तेच्या बळावर एकत्र येऊ लागले. आधुनिक गणितीय तर्कशास्त्राचा जनक समजला जाणारा जॉर्ज बूल केम्ब्रिजला गणिताचा प्राध्यापक होता. पण त्याचा बाप चांभार होता आणि आई घरगुती मोलकरीण.युरोपीय समाजात जातिव्यवस्था नाही,तर समान आर्थिक हितसंबंध जपणाऱ्या "व्यापाऱ्यांचे गिल्ड" अतिशय प्रभावी बनले.


बुद्ध


महाभारतातली यमुनाकाठच्या खांडववन दहनाची घटना बहुधा तीन हजार वर्षांपूर्वी घडली.वनाच्छादित भारतात पशुपालक आर्यांचा विस्तार होत असताना यज्ञसंस्कृतीला मोठे महत्त्व प्राप्त झाले.नव्या मुलखात वस्ती करताना वनप्रदेशात आश्रम स्थापन करून मोठ्या प्रमाणात लाकूड जाळत तिथे गुरांना अनुकूल अशी माळराने निर्माण करायची.ह्याला विरोध करणाऱ्यांना राक्षस-असुर अशा संज्ञा देऊन त्यांच्यावर पशुपालकांतील योद्ध्या क्षत्रियांनी आक्रमण करून हटवायचे अशी प्रणाली प्रस्थापित झाली.गंगेच्या खोऱ्यात जसजसे मूळचे सालाचे अरण्य तोडले गेले आणि रानात शिकार कंदमुळे आणि फिरती शेती करणाऱ्या नाग असुरांसारख्या समाजाच्या जागी स्थायी शेती व जोडीला पशुपालन करणाऱ्यात समाजाची वसाहत वाढत गेली,तसतसे यज्ञाचे जे मूळचे जंगल नष्ट करत जमीन स्थिर शेती-पशुपालनाखाली आणण्याचे कार्य होते ते संपुष्टात आले.तदनंतरच्या पाच शतकात बहुधा संपूर्ण गंगा खोऱ्यात जिथे सहज शक्य होते,तिथे कृषि पशुपालन संस्कृतीचा विस्तार पुरा झाला.या कारणे बुद्धाच्या काळात,दोन हजार पाचशे वर्षांपूर्वी, यज्ञाचे मूळ समर्थन गैरलागू झाले.


ह्या सर्व काळात,नव-नवा प्रदेश पादाक्रान्त करणारी आक्रमक संस्कृती वरचढ होती.एक वर्णव्यवस्था रूढ होत गेली.

ब्राह्मणांची,क्षत्रियांची,वैश्यांची,शूद्रांची कर्तव्ये त्यांनी परंपरेप्रमाणे बजावणे हेच सर्वश्रेष्ठ मूल्य;दुसरी काहीही मूल्ये मानू नयेत,असे प्रतिपादन केले गेले.ह्या व्यवस्थेत खालच्या आणि वरच्या वर्णाच्या लोकांच्यातील देवाण-घेवाण ही उघडपणे खालच्या वर्गांच्या दृष्टीने अन्याय्य होती. 


ज्ञानेश्वरीतल्या अठराव्या अध्यायात म्हटलेच आहे ना :


तेचि चारी वर्ण । पुससी जरी कोण कोण । 

तरी जयां मुख्य ब्राह्मण । धुरेचे कां ।। ८१८ ।। 

येर क्षत्रिय वैश्य दोन्ही । तेही ब्राह्मणाच्याचि मानिजे मानी । जे ते वैदिकविधानीं । योग्य म्हणौनि ।। ८१९ ।। चौथा शूद्रु जो धनंजया । वेदीं लागु नाहीं तया । तह वृत्ति वर्णत्रया । आधीन तयाची ।। ८२० ।। तिये वृत्तिचिया जवळिका । वर्णा ब्राह्मणादिकां । शूद्रही कीं देखा। चौथा जाला ।।


साहजिकच यज्ञसंस्कृतीबाबत असंतोष व विरोध पसरत होता.यज्ञात मोठ्या प्रमाणात पशू - शेतकऱ्यांची गोसंपदाही बळी दिली जायची.त्याबाबत शेती-पशुपालन करणाऱ्यांवर जो बोजा पडत होता त्याबद्दल चीड उत्पन्न होत होती.क्षत्रियांनी सतत कर्तव्य म्हणून लढलेच पाहिजे,हिंसा केलीच पाहिजे,हे नाकारण्याचा विचार निर्माण होऊ लागला होता. करुणा,मैत्री अशीही मूल्ये महत्त्वाची असू शकतील असे मनात येऊ लागले होते.अशा काळात शाक्य गौतमाचा जन्म झाला.नदीच्या पाण्यावरून शाक्यांचा शेजारच्या टोळीशी सतत संघर्ष चालू होता.अशा संघर्षात लढणे, हिंसा करणे हे गृहस्थाश्रमी गौतमाचे कर्तव्य होते.पण ही समाजरचना बदलली पाहिजे,वेगळ्या मूल्यांचा विचार केला पाहिजे,असे मनात आणून त्याने गृहस्थाश्रमाचा त्याग केला.देहदंड करणारे तप केल्यावर ह्यातून काही चांगले निष्यत्र होत नाही,असे त्याच्या मनात आले आणि मग त्याला चार आर्यसत्ये समजली.अशी अगदी वेगळी मुल्ये,मग तो प्रतिपादन करत राहिला.समाजशील मानवाच्या मनात जी स्वार्थपरायणता आणि समूहासाठी काहीतरी त्याग करतही वेगळे करायला पाहिजे अशी जी भावना असते,त्या प्रवृत्तीचे समर्थन करत त्याने धर्मरचना केली.


बुद्ध सांगतो की जगात दुःख आहे हे कोणालाही नाकबूल करता येत नाही.परंतु जो तो आपले दुःख कसे नष्ट होईल याच विचारात असतो.त्याचा परिणाम असा होतो की,दुसऱ्याचा घातपात करून देखील प्रत्येक जण आपण सुखी होऊ इच्छितो.त्यांत जे हिंसक असून बुद्धिमान असतात,ते पुढारी बनतात,व इतरांना त्यांचे ताबेदार व्हावे लागते.हिंसक बुद्धीमुळे या पुढाऱ्यात देखील एकोपा राहत नाही आणि त्यांना सगळ्यांत जास्त हिंसक आणि बुद्धिमान पुढाऱ्याला आपला राजा करून त्याच्या तंत्राने वागणे भाग पडते.राजाला आपले राज्य दुसरा राजा घेईल असे भय वाटते,

आणि त्याच्या सुरक्षितपणासाठी तो यज्ञयाग करून अनेक प्राण्यांचे बळी देतो.अशा प्रकारची मनुष्यांना आणि इतर प्राण्यांना उपद्रवकारक समाजरचना नष्ट करून तिच्या जागी दुसरी हितसुखकर संघटना उभारावयाची असेल, तर प्रत्येकाला आपले आणि इतरांचे दुःख एक आहे अशी जाणीव झाली पाहिजे;आणि म्हणूनच बुद्ध भगवंताने पहिल्या आर्यसत्यांत सर्वसाधारण दुःखाचा समावेश केला.सामाजिक पशुंच्यात इतरांवर कुरघोडी करण्यासाठी सतत चढाओढ चालते.ह्या चढाओढीत सरशी होण्यासाठी प्राणी दिमाख दाखवण्याच्या मागे लागतात,व असा तोरा मिरवण्यासाठी उधळपट्टी करत राहतात.ही उधळपट्टी करण्याची ओढ,म्हणजेच मानवाची अनेक तऱ्हेची हाव अथवा तृष्णा. मनुष्याची तृष्णा हेच दुःखाचे खरे कारण आहे,हे बुद्ध भगवन्ताचे महत्त्वाचे प्रतिपादन होते.हे होते पहिले आर्यसत्य.ही तृष्णा जोपर्यंत असेल तोपर्यंत दुःख उत्पन्न होणारच,हे दुसरे आर्यसत्य.तृष्णेचा नाश करण्यानेच मनुष्य दुःखांतून मुक्त होतो,हे तिसरे आर्यसत्य. तृष्णानाशाचा उपाय म्हटला म्हणजे दोन अंतांच्या, देहदंड व भोगवाद ह्यांच्यामधून जाणारा आर्य अष्टांगिक मध्यम मार्ग,हे चौथे आर्यसत्य.


पण बुद्धाने स्पष्ट केले की तो जे काय सांगतो ती अधिकारवाणी मानू नये.ते विचारान्ती तुम्हाला पटले तरच मान्य करा.वास्तव नीट जाणायचे असेल तर कोणतीही अधिकारवाणी न मानता सर्व विधाने वास्तवाच्या निकषावर पडताळून पाहणे हा एकच परिणामकारक मार्ग उपलब्ध आहे.






१८/२/२६

जैवविविधतेची गलबते / Biodiversity trends

झाडांचा वापर करणारे बहुतांश प्राणी त्यांना इजा करत नाहीत.झाडाचा डेरा किंवा खोडातून येणारा उजेड आणि आर्द्रता जागेनुसार बदलते.यामध्ये पर्यावरणीय कोनाडा शोधून तिथे ते आपलं घर बनवतात.संशोधकांकडून झाडाच्या वरच्या भागाचा फार अभ्यास झाला नाही,कारण त्यासाठी त्यांना क्रेनचा वापर करावा लागेल किंवा बांधकामात वापरतात तसे पहाड बांधावे लागतील.हे खर्चीक असते.

त्यामुळे खर्च कमी ठेवण्यासाठी शास्त्रज्ञ काही क्रूर पद्धतीचा वापर करतात. 


द हिडन लाईफ ऑफ ट्रीज

पी ट र वो ह्ल ले बे न

अनुवाद - गुरुदास नूलकर

अरविंद घनश्याम पाटकर

 मनोविकास प्रकाशन


२००९ साली बाव्हेरियन राष्ट्रीय अभयारण्यात मार्टिन गॉसनर नावाच्या संशोधकाने सहाशे वर्ष जुन्या आणि १७० फूट उंच झाडावर कीटकनाशक फवारणी केली.पायरेथ्रम या रासायनिक कीटकनाशकामुळे लाखो कोळी आणि कीटक जमिनीवर मरून पडले.या जीवघेण्या औषधामुळे शास्त्रज्ञांना झाडावर असलेली जैवविविधता कळली.यामध्ये २५७ प्रजातींचे कीटक होते आणि २०४१ इतकी त्यांची संख्या होती. झाडाच्या डेऱ्यात वैशिष्ट्यपूर्ण पाणथळ जागाही सापडतात.जेव्हा एखादे खोड दुभंगते तेव्हा त्यात पावसाचे पाणी साठते.त्या इवल्याशा तळ्यामध्ये छोट्या माशांना आसरा मिळतो आणि एका दुर्मिळ प्रकारच्या बीटल कीटकाला खाद्य. 


झाडाच्या खोडात तयार झालेल्या पोकळीमध्ये राहाणे तसे सोपे नाही.तिथे अंधार असतो आणि बुरसटलेल्या पाण्यात प्राणवायूचा अभाव असतो. अशा ठिकाणी जन्म घेतलेल्या अळ्यांना श्वास घेता येत नाही.पण जर त्यांच्या नाकाला पाणबुड्यासारखी लांब नळी असली तर मात्र ते इथे तग धरू शकतील.भुग्याच्या पिलांना अशीच नळी असते ज्याच्यामुळे ते इथे जिवंत राहू शकतात.त्यांच्याव्यतिरिक्त इथे फक्त सूक्ष्म जिवाणू असतात,त्यामुळे बहुधा हेच त्या भुंग्यांच्या पिलांचे खाद्य असेल.


सुतार पक्षी प्रत्येक झाडांमध्ये आपले घरटे बनवत नाही.

त्यामुळे प्रत्येक झाडाच्या नशिबी कुजून जाणे नसते.आणि यामुळेच काही विशिष्ट प्रजातींना दुर्मिळ आसरे मिळू शकतात.अनेक झाडं लवकर मरतात.वादळात एखाद्याचे खोड मोडून जाऊ शकते किंवा खोडावर आक्रमण करणारे बीटल एखाद्या झाडाचे साल काही आठवड्यातच नष्ट करू शकतात,ज्यामुळे थंडीत ते झाड मरून जाते किंवा झाडाभोवतीची परिस्थिती अचानक बदलू शकते.झाड मेले की त्याच्या गोड द्रव्यावर जगणारे प्राणी आणि बुरशीला मात्र या मृत वृक्षाला सोडून जावे लागते.एक छोटे विश्व संपून जाते,संपते की नवीन सुरुवात होते ?


'आणि जेव्हा मी जातो तेव्हा माझा फक्त एक भाग जातो.' जर्मन गायक पीटर मॅफेचे हे गाणे जणू एका झाडासाठीच लिहिलेले आहे. 


कारण वठलेल्या झाडाचे खोड हे जंगलाच्या जीवनचक्रामध्ये जिवंत झाडाइतकेच महत्त्वाचे असते.अनेक शतकं या झाडाने जमिनीतली पोषणद्रव्ये शोषून आपल्या लाकडात आणि सालात साठवलेली असतात.आणि आता त्या मृत वृक्षांच्या पिलांचे हेच खाद्य होणार असते.पण आपल्या पालकांमध्ये दडलेले हे खाद्य त्यांना थेट सहजपणे मिळणार नसते.हे मिळवायला त्यांना इतर सजीवांची मदत घ्यावी लागते.ज्या क्षणी ते मृत झाड जमिनीवर पडते त्याक्षणी बुरशी आणि हजारो प्रकारचे कीटक त्या खाद्याकडे पोचण्याच्या शर्यतीत जुंपतात.प्रत्येक सजीव त्या वठलेल्या झाडाच्या विशिष्ट भागाकडे आकर्षित होतो आणि कुजण्याच्या प्रक्रियेत वेगळी भूमिका साकारतो. आणि त्यामुळेच या प्रजातींचा जिवंत झाडाला धोका नसतो.त्यांच्यासाठी ते फारच ताजे लाकूड असते.त्यांना आवडतं ते मऊ तंतुयुक्त दमट असं लाकूड.हे कीटक त्यांच्या खाद्यासाठी आणि जीवनचक्रासाठी भरपूर वेळ घेतात.स्टॅग बीटल आपल्याला याचे प्रात्यक्षिकच देतो प्रौढ बीटल काही आठवडेच जिवंत राहतो,पण त्यात त्याला प्रजनन करण्याची संधी मिळते.या कीटकाचे बहुतांश आयुष्य अळी अवस्थेत असते.आणि या अवस्थेत तो मेलेल्या झाडांची मुळं संथपणे खात असतो. लड्डू होऊन आपला कोश बनवण्यासाठी त्याला सुमारे आठ वर्ष लागू शकतात.


ब्रकेट फंगस अशीच संथपणे वाढत असते.ही बुरशी मेलेल्या खोडावर एखाद्या मोडक्या थाळीप्रमाणे चिकटून असते आणि फडताळासारखी दिसते. त्यावरूनच ब्रकेट हे नाव पडले आहे.लाल पट्ट्याचा कॉन्क हे अजून एक उदाहरण.ही बुरशी लाकडामधील पांढऱ्या सेल्युलोजच्या तंतूवर ताव मारते आणि याचा पुरावा म्हणजे तिच्याभोवती तपकिरी चुरा पडलेला सापडतो.मोडक्या थाळीसारखा दिसणारा या बुरशीचा फळणारा अवयव खोडाला काटकोनात चिकटलेला असतो. फक्त या स्थितीमध्येच बुरशीचे बीजाणू तिच्या खालच्या भागात असलेल्या छोट्या नलिकेतून बाहेर पडू शकतात.तिने जखडून ठेवलेलं कुजकं झाड जर मरून खाली पडलं तर ही बुरशी आपल्या बीजाणू सोडणाऱ्या नलिका बंद करून ठेवते आणि पुन्हा काटकोनात वाढायला सुरुवात करते.


- काही बुरशी खाद्य मिळवण्यासाठी कडव्या स्पर्धेत उतरतात.खाली पडलेल्या लाकडाच्या तुकड्याचा काटछेद घेतला तर हे चित्र स्पष्ट दिसते.फिक्या आणि गडद रंगाची बुरशी काळ्या रेषांनी विभाजलेली दिसते.प्रत्येक रंगाची बुरशी एक वेगळी प्रजाती असते.आपल्या हद्दीत दुसरी प्रजाती येऊ नये म्हणून ते गडद रंगाच्या रासायनिक (पॉलिमरच्या) भिंती बांधतात.


प्राणी आणि वनस्पतींच्या एक पंचमांश,म्हणजे आपल्याला माहीत असलेल्या पैकी सहा हजार प्रजाती मेलेल्या लाकडावर जगतात. ५० आधी म्हटल्या प्रमाणे हे लाकूड पोषणद्रव्यांच्या चक्रीयतेत उपयुक्त असते.पण याचा जंगलात काही धोका असू शकतो का? कारण जर एखाद्या क्षेत्रात पुरेसं लाकूड पडलेलं नसेल तर हे सजीव जिवंत झाडांना आपलं खाद्य बनवतील.जंगलात येणाऱ्या अनेक पर्यटकांकडून ही शंका आम्हाला विचारली जाते. आणि अनेक खाजगी जंगलांचे मालक मोठे मोठे पडलेले खोडही उचलत नाहीत.तसे करणे गरजेचे नसते आणि त्याचा तसा फायदाही नाही.मेलेली खोड उचलून टाकल्यामुळे फक्त कीटकांचे अधिवास नष्ट होतात,कारण जगण्यासाठी जिवंत लाकूड त्यांना उपयोगी नसते.जिवंत लाकूड पाहिजे तेवढे मृदू नसते,अधिक दमट असते आणि त्यात खूप साखर असते.

आणि मुख्य म्हणजे या कीटकाच्या वसाहती होऊ नये यासाठी बीच,ओक आणि स्प्रूस स्वतःचे संरक्षण करतच असतात. 


सशक्त झाडांना योग्य पोषण मिळाले तर जवळजवळ प्रत्येक आक्रमणापासून ते सुरक्षित राहू शकतात.आणि विघटन करणारे हे सैन्य जोपर्यंत जंगलात राहू आणि वाढू शकते तोपर्यंत जिवंत झाडांना पोषण मिळत राहते.


पडलेली फांदी एखाद्या नवीन रोपासाठी पाळणा बनते.

मेलेल्या झाडांचा जिवंत झाडांना थेट उपयोग होतो. विशेषतः स्प्रूसची रोपटी आपल्या मृत पालकांवर उगवताना दिसतात.याला इंग्रजीमध्ये नर्स-लॉग प्रजनन म्हणतात आणि जर्मन मध्ये हे शव-प्रजनन. मेलेल्या फांदीच्या कुजक्या लाकडात पाणी चांगल्या प्रकारे साठवलेले असते आणि त्यात लाकडातील काही पोषणद्रव्ये जी कीटक आणि बुरशीमुळे बाहेर निघालेली असतात,तीसुद्धा या कुजलेल्या लाकडात शाबूत असतात.पण तरीही असे कुजलेले लाकूड काही जमिनीतल्या मातीची जागा घेऊ शकत नाही,कारण इथली पोषणद्रव्ये हळूहळू नाहीशी होत राहतात.त्यामुळे एके दिवशी ते कुजलेले लाकूड जंगलाच्या मातीत जैविकमाल होऊन मिसळणार असते.मग त्या वर उगवलेल्या रोपट्यांचे काय होणार? असे झाल्यास त्यांच्या मुळांचा आधार जाऊन ती उघडी पडतील.पण हे होण्यासाठी काही दशकं जातात.

नंतर ही मुळं कुजणाऱ्या लाकडाबरोबरच मातीत शिरतात.

अशा पद्धतीने वाढलेल्या स्प्रूसचे रोपटे मोठे झाल्यावर खांबावर उभे केल्यासारखे दिसते.ज्या ओडक्यावर त्यांची वाढ होते तिच्या उंची इतके त्यांचे खांब उंच होतात…


समाप्त…!!


१६/२/२६

नरसंहाराची साक्षीदार / Witness to the genocide

१२.०२.२६ या लेखातील पुढील शेवटचा भाग…


त्या टॉयलेटला जातात.त्यांच्यापैकी मोठ्या मुली-बायकांची मासिक पाळी येते.इमॅक्युली लिहिते,'पार्दींनी बजावल्याप्रमाणे शेजारच्या संडासातून फ्लशचा आवाज आल्यावरच इकडेही फ्लश करायचं,हा नियम आम्ही कसोशीने पाळला,पण त्या काळात दुसरं कोणी टॉयलेटला बसलेलं पाहिल्याचं किंवा घाण वास आल्याचं मला आठवत नाही.एवढंच काय,आमच्या मासिक पाळ्याही येऊन गेल्या,पण पाद्रींकडे टिश्यू पेपरची मागणी करण्यापलीकडे त्याकडे आमचं लक्षही गेलं नाही.जिवंत राहण्याच्या आव्हानापुढे त्या सगळ्या गोष्टी क्षुल्लक होत्या.'


इमॅक्युलीच्या दृष्टीने सगळ्यात मोठं आव्हान असतं ते स्वतःच्या मनात घोंघावणारं वादळ शांत करण्याचं.अनेकदा पाद्री त्यांना बाहेर काय चालू आहे याची खबर देत असतात.त्या सगळ्या बातम्या एकीकडे सुन्न करणाऱ्या तर दुसरीकडे मन विखाराने भारून टाकणाऱ्या असतात.ती लिहिते, 'ज्यूंच्या वंशविच्छेदानंतर आता पुन्हा असं घडू द्यायचं नाही अशी प्रतिज्ञा साऱ्या जगाने केली आहे असं मला वाटत होतं; पण आता आम्ही सहाजणी काहीही कारण नसताना या बाथरूममध्ये मरणाची वाट पाहत थांबलो होतो.देव आम्हाला कशाची शिक्षा देत होता?'

अनेकदा तिचं मन हुतू-तुत्सींमधील या संघर्षांचा विचार करण्यात गुंतून जातं.आम्ही वर्षानुवर्षं एकत्र नांदत आलोय.एकमेकांशी लग्न केल्यामुळे आमचे जीन्सही आता एकमेकांत मिसळून गेले आहेत.

आमचे धर्म एक आहेत,आमची संस्कृती एक आहे;मग विद्वेषाचं नेमकं कारण तरी काय, हा सवाल राहून राहून तिच्या मनात येतो.


तर त्याउलट,तुत्सींना 'झुरळ, साप' अशा नावाने संबोधणाऱ्या आरोळ्यांमुळे कधी कधी इमॅक्युलीच्या मनातही संताप उफाळून येत असतो.कधी कधी तर तिला वाटतं,'माझ्याकडे एखादी मोठी मशिनगन आली तर मी सगळ्या हुतूंना संपवून टाकेन.' पण मन हुतूंचं असं बरं-वाईट चिंतू लागलं की पापभीरू आणि देवभक्त इमॅक्युलीला स्वतःची लाज वाटू लागते.'आपल्या मनात असे विचार येत असतील तर आपल्यात आणि त्यांच्यात फरक तो काय राहिला? आणि मग आपण कोणत्या तोंडाने देवाकडे आपल्याला वाचवण्यासाठी प्रार्थना करायची ?' हे द्वंद्व तिच्या मनात सतत चालू असतं. हुतू जे करताहेत ते पाहता त्यांचा तिरस्कार करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही.आणि तसं करायचं तर आपल्याला देवाच्या दारी स्थान नाही.हा कलह सोडवण्यात तिची रोजची बरीच शक्ती खर्च होत असते


आपण करतोय ती प्रार्थना पोकळ आहे असं तिला वाटू लागतं.

असे अनेक दिवस जातात.अखेर एके दिवशी तासन् तासांच्या विचारानंतर तिला मार्ग सापडतो. तिला वाटतं,देवच आपल्याला आपल्या प्रश्नाचं उत्तर देतोय. तो म्हणतोय, 'तुत्सी आणि हुतू दोघंही माझीच मुलं आहेत.मुलं चुका करतात.त्यांना त्यांची चूक कळेल.'येशू ख्रिस्ताचं ते प्रसिद्ध वाक्य आपल्या सर्वांनाच माहिती असतं : 'देवा, त्यांना माफ कर.ते काय करताहेत त्यांना कळत नाहीये.' पण ते स्वतःच्या अंतर्मनातून येण्यासाठी इमॅक्युलीसारखंच अग्निपरीक्षेतून जावं लागत असावं. हे वाक्य तिच्या मनात येतं आणि संघर्ष संपतो


त्यानंतरचा काळ कमी कठीण नसतो;पण किमान देवावरचा विश्वास,सातत्याने ओठावर असणारी प्रार्थना आणि जपाची माळ यांची सोबत इमॅक्युलीला असते.


मधल्या काळात मारेकरी पुन्हा एकदा पार्दींंच्या घरात पोहोचतात.

या वेळी ते थेट पाद्रींच्या बेडरूममध्ये,या सहाजणी असलेल्या बाथरूमजवळच येतात. त्यांच्याकडे अजूनही खात्मा न झालेल्या तुत्सींची यादी असते आणि त्यात इमॅक्युलीचं नाव असतं.ते घरात शिरतात तेच तिच्या नावाचा पुकारा करत. त्यातला एकजण ओरडत असतो, "इमॅक्युली... कुठे आहे ते झुरळ ? तिला मारलं की माझ्या नावावरचा आकडा ४०० होईल.कसा भारदस्त वाटतोय की नाही हा आकडा!" पुन्हा एकदा इमॅक्युलीच्या मनात येतं, 'आता आपण नक्कीच संपलो.' त्या क्षणी ती प्रार्थनेत इतकी व्यग्र असते, की आपण देवाच्या अतिशय जवळ आहोत असं तिला वाटत असतं.आता काही झालं तरी हरकत नाही, असा विचार करून ती मृत्यूला सामोरं जाण्याचं ठरवते; पण त्या मारेकऱ्यांना बाथरूम सापडत नाही. इमॅक्युली पुन्हा एकदा बचावते.


पण त्या दिवशी रात्री पाद्री त्यांना आणखी एक धक्कादायक बातमी देतात.त्यांचं म्हणणं असतं, "तुत्सींचं हत्याकांड इतक्या जोरकसपणे राबवलं जातंय की रवांडामध्ये बहुतेक तुम्हीच सहा तुत्सी जिवंत असाल." हा धक्का पचवण्यापलीकडचा असतो. 'याचा अर्थ आणखी कितीही दिवस लपून राहिलं तरी बाहेर आल्यावर आपण मरणारच.मग कशाला लपून रहा?' असा सवाल त्यांच्या मनात उठतो.दुसरा विचार असतो तो घरच्यांचा. 'म्हणजे आपले आई-वडील-भाऊ सगळे मारले गेले?' इतके दिवस इमॅक्युली या आशेवर जगत असते, की जशी मी लपून राहिले तसेच तेही कुठे तरी सुरक्षित असणार.आणखी काही दिवसांनी का होईना, आपली भेट होईल.पण या बातमीने त्या सगळ्या आशा चक्काचूर होतात.आता पुढे काय,हा प्रश्न तिला व्यापून राहतो.त्या दिवशी त्या साऱ्याजणी पार्दींना रेडिओ लावण्याची विनंती करतात.तिथे काही तरी बरी बातमी ऐकायला मिळेल असं त्यांना वाटत असतं; पण त्यांना ऐकू येतो तो एका मंत्र्याचा उन्मादी आवाज.तो रेडिओवरून हुतूंना आवाहन करत असतो,की 'जेवढे म्हणून तुत्सी आहेत त्या सगळ्यांना मारून टाका. वृद्ध-लहान मुलं-तान्ही बाळं,कुणालाही जिवंत ठेवू नका.कारण ते अस्तनीतले साप आहेत.बाळांना तुम्ही सोडून दिलंत तर उद्या मोठे होऊन ते तुमचा जीव घेतीलच.तुत्सींना मारणं हे तुमचं कर्तव्य आहे.' पाद्री सांगत असतात ते खरं असल्याचा पुरावाच त्यांना मिळतो.पण थोड्याच वेळात पाद्री बीबीसीच्या बातम्या लावतात. तिथे त्यांना रवांडन पॅट्रिऑटिक फ्रंटम्हणजे तुत्सींच्या सैन्याची खबर ऐकायला मिळते.ते सैन्य आता रवांडाच्या राजधानीजवळ आलेलं असतं.

इमॅक्युली प्रार्थना करते,की लवकरात लवकर हे सैन्य सरकारचा ताबा घेऊ दे;अन्यथा,आपण वाचणं अशक्य आहे याची तिला खात्री वाटू लागलेली असते.


या सहाजणींना बाथरूममध्ये लपून महिना होऊन गेलेला असतो.अजूनही बाहेरचा हिंसाचार थांबायचं नाव घेत नसतो.

पाद्रींनी त्यांना लपवलेलं असलं तरी बाहेरच्या वातावरणाचा त्यांच्यावरही परिणाम होत असतोच.एके दिवशी ते येतात आणि इमॅक्युलीला म्हणतात, "तुझे वडील फार वाईट होते.ते आरपीएफला छुपी मदत करत होते.तुमच्या घरी ६०० बंदुका सापडल्या आहेत.हुतूंनी हात-पाय हलवले नसते तर तुम्ही आम्हाला मारूनच टाकलं असतंत." इमॅक्युली यावर विश्वास ठेवणं शक्यच नसतं.पण अशा अफवा पसरताहेत त्याअर्थी आपले वडील जिवंत नसणार हे तिला पुन्हा एकदा कळून चुकतं. शिवाय,

ज्याअर्थी पाद्री आपल्याशी या भाषेत बोलण्याचं धाडस करताहेत त्याअर्थी आपलेही फारसे दिवस राहिलेले नसणार याचीही जाणीव होते.कदाचित पाद्रींचा विचार आता बदलला असेल आणि तेच आपल्याला हुतूंच्या हवाली करणार असतील.एकदा ते म्हणतात,

"आता आणखी काही दिवस असंच सुरू राहिलं तर माझ्याकडे तुम्हाला देण्यासाठी अन्नही नसेल.मग मी काय करेन कुणाला माहिती!" पाद्रींकडे बंदुक असल्याचं इमॅक्युलीने पाहिलेलं असतं.

तेच आपल्याला मारून टाकणार नाहीत ना,असाही विचार तिच्या मनात येतो.एकदा ते त्यांच्याबरोबर प्रार्थना करतात आणि त्यांना सांगतात, "मी तुम्हाला किवू सरोवरातल्या बेटावर पाठवण्याचा विचार करतोय.तिथे तुम्हाला हबर्शीच्या बायका म्हणून राहावं लागेल.पण तिथे किमान तुम्ही जिवंत तरी राहाल." इमॅक्युलीला जाणवतं,की आपल्यासारखीच पाद्रींच्याही मनात विचारांची खळबळ माजलेली असणार.त्यामुळेच ते भलभलते विचार करताहेत. त्यामुळे ते प्रत्यक्ष तसं करणार नाहीत,या आशेवर इमॅक्युली प्रार्थना करत राहते.घडतंही तसंच.उलट, थोड्याच दिवसांत एक आनंदाची गोष्ट घडते.पाद्रींच्या दहा मुलांपैकी काही इमॅक्युलीचे मित्र असतात युद्धाला तोंड फुटल्यामुळे ते घरी परतलेले असतात. पाद्री त्यांना त्यांचं गुपित सांगायचं ठरवतात आणि एके रात्री त्यांची भेटही घडवून देतात.त्या दोघांनाही इमॅक्युलीला पाहून अतिशय आनंद होतो.तो आनंद पाहणंही इमॅक्युलीसाठी प्रचंड धीर देणारं असतं. सगळेच हुतू आपल्याला मारायला टपलेले नाहीत याची जाणीव सुखद असते.


मध्ये एकदा इमॅक्युलीला आणखी एक चांगली बातमी कळते.

शांतता प्रस्थापित करण्यासाठी युनायटेड नेशन्स आता रवांडामध्ये दाखल होणार आहे.तिला काय वाटतं कुणास ठाऊक,पण ती मनाने घेते,की हा नरसंहार थांबल्यावर पुन्हा नवं आयुष्य सुरू करायचं असेल तर त्यासाठी इंग्रजी शिकावं लागेल.

किन्यारवांडा या तिच्या मातृभाषेबरोबर तिला फक्त फ्रेंच येत असतं.पण ती पाद्रींच्या विनवण्या करून फ्रेंच इंग्रजी डिक्शनरी आणि काही इंग्रजी पुस्तकं बाथरूममध्ये मागवून घेते.तसंही जागेपणीचा प्रत्येक क्षण प्रार्थनेत घालवणाऱ्या इमॅक्युलीचं आजूबाजूला लक्ष नसतंच.आता प्रार्थनेतला थोडा वेळ कमी करून ती झपाटल्यासारखी डिक्शनरीवरून इंग्रजी शिकायला सुरुवात करते.महिन्याभरात तिला तोडकं-मोडकं का होईना,इंग्रजी वाचता-बोलता येऊ लागतं.


बाथरूममधल्या बंदिवासाला दोन महिने उलटल्यानंतर पाद्री आणखी दोन तुत्सी मुलींना त्या बाथरूममध्ये सोडतात.आधी सहाजणी मावणं अशक्य वाटत असतं, पण आता आणखी दोघीदेखील त्यात सामावून जातात. त्या दोघींकडून इमॅक्युलीला बाहेरची हालहवाल कळते. त्या कहाण्या न ऐकवणाऱ्या असतात.


त्या सांगतात, "हुतू लोक हातांत नंग्या तलवारी घेऊन फिरताहेत.ज्यांच्याकडे ओळखपत्र नाही अशा हुतूंनाही प्राण गमवावे लागताहेत.कचऱ्याचे ढीग असावेत तसे रस्त्यांवर प्रेतांचे ढिगारे पडलेले आहेत.त्यांचं दफन करायलाही माणसं उरलेली नाहीत.'आपण आता कशासाठी जगायचं,हा विचार सगळ्यांनाच व्यापून टाकतो.इमॅक्युली लिहिते,'आपलं कुणीही उरलेलं नाही,

आता आपल्याला जगण्याची गरज नाही,हा विचार तुम्हाला खोल गर्तेत घेऊन जाणारा असतो.एकदा का जगण्याची इच्छा संपली की तुम्हाला कुणी वाचवू शकत नाही.


आम्हीही त्याच टोकावर होतो;पण कशी कोण जाणे माझ्या मनात मात्र जगण्याची इच्छा टिकून होती.ज्याअर्थी इतक्या हालअपेष्टा सहन करून मी वाचले आहे,त्याअर्थी मला जगवण्यामागे देवाचं काही तरी प्रयोजन असणार.मी जगायला हवं.' हा विचारच इमॅक्युलीला जगवतो.


पुढे तुत्सी बंडखोर युद्ध जिंकतात.बचावलेल्या तुत्सींची सुटका करण्यासाठी युनायटेड नेशन्स फ्रान्सचं सैन्य रवांडात पाठवतं.

हत्याकांडही काहीसं थंडावतं. ठिकठिकाणी फ्रेंच सैन्याचे कॅम्प लागतात.बचावलेल्या तुत्सींनी या कॅम्पमध्ये दाखल व्हावं असं आवाहन केलं जाऊ लागतं.अखेर तीन महिन्यांनंतर पाद्री मुरिन्झी इमॅक्युली आणि इतर बायका-पोरींना बाहेर काढतात. तीन महिन्यांनंतर पहिल्यांदाच त्यांना मोकळी हवा मिळते.मध्यरात्री लपून-छपून या आठजणी फ्रेंच कॅम्पमध्ये पोहोचतात.या कॅम्पमध्ये काही काळ काढल्यावर इमॅक्युली देशाच्या राजधानीत येऊन पोहोचते.या प्रवासात तिला दिसतात त्या फक्त विनाशाच्या खुणा...उद्ध्वस्त शहरं,

मेलेल्या माणसांचे खच,ती प्रेतं


लेफ्ट टु टेल: डिस्कव्हरिंग गॉड अमिस्ट द खांडन होलोकास्ट' हे इमॅक्युली इलिबागिझा हिने स्टीव्ह एर्विनसोबत लिहिलेलं पुस्तक अ‍ॅमेझॉन,इतर वेबसाइट्स तसंच अ‍ॅमेझॉन किंडलवर उपलब्ध आहे.इमॅक्युलीचं वास्तव्य सध्या अमेरिकेत आहे.


खाण्यासाठी उडालेली कुत्र्या-गिधाडांची झुंबड,त्यातून निर्माण झालेली रोगराई,कॅम्पमध्ये दाखल होणारी अनाथ मुलं-बायका आणि त्यांच्यावर गुदरलेल्या प्रसंगांच्या अमानुष कहाण्या.त्यातल्या काही कहाण्या तिच्या घरच्यांच्याही असतात.आई-वडील आणि तिचे दोघं भाऊ असेच अमानुष पद्धतीने मारले गेलेले असतात.ओळखी पाळखीच्या लोकांकडून त्या तिच्यापर्यंत येऊन पोहोचतात.त्या तिला ऐकाव्याही लागतात.पण हे सगळं सहन करूनही इमॅक्युली उभी राहते.स्वतःच्या जगण्याचं प्रयोजन शोधण्याचा ती प्रयत्न करत राहते.


अखेर ते प्रयोजन तिला सापडतं आपण जगलोय ते आपली कहाणी, रवांडाची कहाणी जगाला सांगण्यासाठी. 'लेफ्ट टु टेल' हे पुस्तक लिहून तिने ते प्रयोजन पूर्ण केलंय.पुस्तकाच्या उपशीर्षकात म्हटल्याप्रमाणे ही गोष्ट तिच्या दृष्टीने देवाचा साक्षात्कार होण्याची असली,तरी ती प्रत्येक वाचकाला वेगळा साक्षात्कार देऊ करते. नरसंहार थांबल्यावर इमॅक्युलीच्या आयुष्यात आणि रवांडामध्ये पुढे काय काय घडतं याची गोष्टही पुस्तकातून उलगडते.पण पुस्तक वाचून झाल्यावर मनात एक वाक्य रेंगाळत राहतं : ही कहाणी वाचल्यावर एखाद्या तरी व्यक्तीला वांशिक जातीय धार्मिक अस्मितेतला फोलपणा कळून येईल का?....समाप्त…!!




१४/२/२६

शून्य गुण,पूर्ण विद्यार्थी : Zero marks,perfect student 

नरसंहाराची साक्षीदार / Witness to the genocide या लेखमालेतील तिसरा भाग हा १५.०२.२६ रोजी प्रकाशित होईल.१३.०२.२६ या दिवशी एक तातडीचा,जिव्हाळ्याचा लेख प्रकाशित करीत आहे.- विजय गायकवाड


https://www.vijaygaikwad.com हा जगातील वाचकांनी भरभरून लोकप्रिय केलेला ब्लॉग,२० देशांमध्ये,२४९ भाषांमध्ये,वाचला जाणारा.. या ब्लॉगवर व्यक्तीने भेट दिली आणि त्यांना काही महत्वाचं काही गवसलं नाही असं कधीच होत नाही.हेच ते या ब्लॉगचे एकमेव वैशिष्ट्य..याच ठिकाणी उजव्या बाजूला Popular Posts हा विभाग आहे.या विभागामध्ये तेच लेख असतात.जे वारंवार जास्तीत जास्त प्रमाणात जास्त देशांमध्ये वाचले जातात.सध्या या ब्लॉगवर ६३२ लेख तर हा लेख प्रकाशित होईपर्यंत वाचकांनी भेट दिलेली संख्या ६८ हजार.।।


सध्या Popular Posts या विभागात …!!


१.अभ्यासाचे महत्त्व /Importance of study


https://www.vijaygaikawad.com/2024/10/importance-of-study.html?m=1


२.विज्ञान संप्रेषण व जागरूकता science communication and awareness


https://www.vijaygaikawad.com/2025/09/science-communication-and-awareness.html?m=1


३.मानवी संस्कार /Human rites


https://www.vijaygaikawad.com/2024/11/human-rites.html?m=1


हे तिन्हीही लेख लिहिले आहेत.आमचे लाडके मित्र डॉ.दीपक शेटे यांनी तर ह्या व्यक्तीला भेटलं की ब्रायन ट्रेसी यांचे तत्वज्ञान समोर येते.


यश म्हणजे स्वातंत्र्य,स्वतंत्र असणं हा जीवनातील सगळ्यात मोठा आनंद आहे.आपल्या मनात जे येईल ते करायला आपण मुक्त आहोत असं वाटणं म्हणजे स्वातंत्र्य..! हे तत्त्वज्ञान मला त्यांच्या पहिल्या भेटीत गवसले.त्यांची माझी भेट ही अजुनही माझ्यासाठी ताजीच आहे.


मी पाहिलेला भला माणूस....?


खरोखरच आपण भला माणूस पाहू शकतो का? तर याचे उत्तर आहे हो.. भली माणसं पुस्तकात जागोजागी दिसतात. आपण त्यांना वाचत वाचत मोठे होतो. पण आपण काही भला माणूस होत नाही.नुसतचं वाचण्याचा हा दिर्घ परिणाम..

आपण आता वाचतोय डॉ.दीपक शेटे यांचा चौथा लेख..!


शून्य गुण,पूर्ण विद्यार्थी : Zero marks,perfect student - मूल्यांकन व्यवस्थेचा पुनर्विचार


रशियाच्या शिक्षण पद्धतीत परीक्षेचा कमाल गुण ५ असतो. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे—एखाद्या विद्यार्थ्याने उत्तरपत्रिका पूर्णपणे कोरी दिली तरी त्याला २ गुण दिले जातात.मॉस्को विद्यापीठात शिकायला गेलो त्या पहिल्याच दिवशी हे कळल्यावर मी अक्षरशः चकित झालो. मला ते अजिबात तर्कसंगत वाटले नाही.कोणी काहीही लिहिले नाही, तर त्याला शून्यच मिळायला नको का?


कुतूहलापोटी मी माझे प्राध्यापक डॉ. थिओडोर मेद्रायेव यांना विचारले,


"सर, एखादा विद्यार्थी काहीही लिहित नाही, तरी त्याला २ गुण देणे कसे योग्य आहे?"


डॉ. मेद्रायेव हसले. शांत आणि विचारपूर्वक आवाजात ते म्हणाले,


"शून्य म्हणजे अस्तित्वच नसणे. एखादी व्यक्ती प्रयत्न करत असताना ती शून्य कशी असू शकते? जरा विचार कर ...


 हा लेख सोशल मीडियावर वाचण्यात आला मग वाटलं आपण याच्यावर चिंतन करावं आणि लिहावं..


शिक्षणव्यवस्थेत गुण हा शब्द अत्यंत प्रभावी आहे.

तो केवळ विद्यार्थ्याच्या उत्तरपत्रिकेवर उमटणारा आकडा नसून,अनेकदा तो विद्यार्थ्याच्या आत्मविश्वासावर,

शिकण्याच्या प्रवृत्तीवर आणि भविष्यातील वाटचालीवर खोल परिणाम करणारा घटक ठरतो. म्हणूनच "रिकाम्या उत्तरपत्रिकेला शून्य गुण द्यावेत की किमान गुण?" हा प्रश्न तांत्रिक नसून मूल्याधिष्ठित आहे.


आजची मूल्यांकन व्यवस्था प्रामुख्याने उत्पादन-केंद्रित (product-oriented) आहे. विद्यार्थी काय लिहितो, किती अचूक लिहितो, हे मोजले जाते; पण तो शिकण्याच्या प्रक्रियेत कुठे आहे, त्याने किती प्रयत्न केले, त्याला कोणत्या अडचणी आहेत—याकडे दुर्लक्ष होते. परिणामी गुण म्हणजे न्याय नसून, अनेकदा निवड आणि नाकारण्याचे साधन बनते.


शून्य गुण : अपयश की अस्तित्व नाकारणे?गणितात शून्य ही एक आवश्यक संकल्पना आहे.पण शिक्षणात शून्य गुण देताना त्याचा अर्थ केवळ "उत्तर अयोग्य" एवढाच राहत नाही. 


तो विद्यार्थ्यापर्यंत पोहोचणारा संदेश असा असतो— "तू काहीच केले नाहीस. तुझी किंमत शून्य आहे."


मानसशास्त्रीयदृष्ट्या हा संदेश धोकादायक आहे.अनेक विद्यार्थी शून्य गुणांना अपयश म्हणून नाही, तर स्वतःच्या क्षमतेवरील अंतिम शिक्का म्हणून स्वीकारतात. अशा वेळी शिकण्याची जिज्ञासा कमी होते, आत्मविश्वास ढासळतो आणि काही विद्यार्थ्यांसाठी शिक्षणापासून दुराव्याची प्रक्रिया सुरू होते.


शिक्षणाचा उद्देश जर विद्यार्थ्यांना पुढे नेण्याचा असेल, तर शून्य गुण हा पूर्णविराम ठरतो—जिथे प्रत्यक्षात अल्पविराम अपेक्षित असतो.


किमान गुण देणे : सवलत नव्हे, मान्यता रिकाम्या उत्तरपत्रिकेला किमान गुण देण्याच्या कल्पनेविषयी एक गैरसमज आहे—


की यामुळे निकष सैल होतील, विद्यार्थ्यांमध्ये आळस वाढेल आणि गुणवत्तेवर परिणाम होईल.

खरं तर किमान गुण देणे म्हणजे यश देणे नाही.

ते म्हणजे एवढी मान्यता देणे की—


"तू या प्रक्रियेचा भाग आहेस. तू प्रयत्नाच्या प्रवासात आहेस."


विद्यार्थी परीक्षा केंद्रात पोहोचतो, उत्तरपत्रिका स्वीकारतो, प्रश्न वाचतो—हे सर्व प्रयत्नच आहेत. उत्तर लिहिता न आल्यामुळे त्याचे मूल्यमापन ज्ञानाच्या अभावावर व्हावे, पण मानवी अस्तित्व नाकारून नव्हे.


किमान गुण ही दयाळूपणाची कृती नसून,

ती शिकण्याच्या प्रक्रियेचा सन्मान करणारी भूमिका आहे.


भारतीय शिक्षणव्यवस्थेत हा प्रश्न अधिक तीव्र का आहे?


भारतात परीक्षा केवळ शैक्षणिक मूल्यांकन नसून, ती सामाजिक आणि कौटुंबिक अपेक्षांशी जोडलेली आहे. गुणांवरच प्रवेश, संधी, प्रतिष्ठा आणि आत्ममूल्यांकन ठरते. अशा परिस्थितीत शून्य गुण हा केवळ आकडा राहत नाही—तो दबाव, न्यूनगंड आणि भीती निर्माण करणारा घटक ठरतो.


म्हणूनच भारतासाठी परदेशी मूल्यांकन पद्धतीची तशीच्या तशी अंमलबजावणी योग्य नाही. मात्र, त्या पद्धतीमागील मानवी दृष्टिकोन स्वीकारणे अत्यावश्यक आहे.


आकड्यांपलीकडे जाणारे मूल्यांकन : गरज आणि दिशा,भारतीय शिक्षणव्यवस्थेसाठी योग्य मार्ग असा असू शकतो—


अंतिम परीक्षेपेक्षा सतत व सर्वांगीण मूल्यमापन

प्रयत्न, सातत्य आणि सहभाग यांना महत्त्व शून्य गुणांऐवजी Feedback-based remarks अपयशानंतर पुनर्प्रयत्न आणि सुधारण्याच्या संधी अशा पद्धतीमुळे गुणवत्ता कमी होत नाही; उलट विद्यार्थ्यांमध्ये शिकण्याची जबाबदारी आणि आत्मविश्वास वाढतो.


निष्कर्ष..!!


खरा प्रश्न हा नाही की— रिकाम्या उत्तरपत्रिकेला किती गुण द्यावेत?

खरा प्रश्न हा आहे—

अपयशाच्या क्षणी आपण विद्यार्थ्याला पुढे जाण्याची दिशा देतो का?

जोपर्यंत एखादी व्यक्ती प्रयत्न करत आहे,

तोपर्यंत तिला संपूर्ण नकार नव्हे,

किमान मान्यता मिळायलाच हवी.

कारण— शिक्षण हे आकड्यांसाठी नसते.

ते माणसासाठी असते.

आणि माणूस—

तो कधीच शून्य नसतो.


-डॉ.दिपक शेटे ( गणितायन लॅब  निर्माते )

गणित शिक्षक आदर्श विद्यानिकेतन अँड ज्युनिअर कॉलेज मिणचे.


दादा सप्रेम नमस्कार,अभ्यासाचे महत्त्व हा आपला लेख लाखो विद्यार्थ्यांच्या जीवनात नव संजीवनी आणल्याशिवाय राहणार नाही.असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे संत तुकारामांच्या या काव्यपंक्तीचा परामर्श विस्ताराने आपण या लेखातून केला आहे. येणाऱ्या शेकडो पिढ्यांना हा अभ्यासाचा सुकर मार्ग दाखवणारा मैलाचा दगड ठरेल.


विनम्र,

सुभाष बाबाराव ढगे | subhashdhage1110@gmail.com

टीप: हे ईमेल https://www.vijaygaikawad.com वरील संपर्क फॉर्म गॅझेट मार्गे पाठवलेले आहे.


शिक्षण संदेश…


शिक्षणाचा एक अर्थ दर्शनाचा होतो.डॉ. दीपक शेटे यांना भेटल्यानंतर तो जाणवतो.त्यांनी ज्या पद्धतीने वरती विवेचन केलेले आहे,ते विचार करायला लावणारे आहे.या अनुषंगाने एक नोंद या ठिकाणी देत आहे.


गो.ना. मुनघाटे गुरुजींचे आत्मचरित्र ' माझी काटेमुंढरीची शाळा ' या पुस्तकाची हेरंब कुलकर्णी यांनी लिहिलेली प्रस्तावना वाचत असताना एक अतिशय सुंदर वाक्य वाचनात आले आणि एकदम थाडकन उडालोच. या वाक्याच्या भोवती बराच वेळ घुटमळलो.स्वतःच्या कर्तव्याची आणि पार पाडत असलेल्या जबाबदारीची जाणीव या वाक्याने करून दिले.आपण आपलं कर्तव्य पाडताना काय करायला पाहिजे ज्यामुळे आपलं कार्य अधिक प्रसन्न,चांगले आणि ज्यांच्यासाठी करतोय ते अधिक हितकारक होईल यावर विचार करायला भाग पाडणारे हे वाक्य...


  • आपल्या विद्यार्थ्यांवरचे निरतिशय प्रेम एवढी शिक्षक होण्याची एकमेव पूर्वअट आहे.जे. कृष्णमूर्तीना एक विद्यार्थी विचारतो की, 'आम्हांला खेळण्यात जितका आनंद वाटतो, तितका अभ्यासात का वाटत नाही ?' कृष्णमूर्ती म्हणतात 'तुझ्या शिक्षकांना शिकवण्यात आनंद वाटत नाही म्हणून तुम्हांला शिकण्यात आनंद मिळत नाही.' ते पुढे म्हणतात, 'एखादी गायिका बैठकीवर गाणे. म्हणण्यापूर्वी हजारो तास रियाज करते. गाणे तिच्या श्वासात आलेले असते. त्यामुळेच ती जेव्हा गायला बसते तेव्हा श्रोते ते गाणे कित्येक वर्षे गुणगुणत राहतात. असे तुझे शिक्षक जेव्हा शिकवण्यावर प्रेम करतील तेव्हा बाळा, शिक्षण हे तुझ्यासाठी खेळण्याइतकेच आनंदी झालेले असेल...!!