* विजय गायकवाड | Vijay Gaikawad

live

नमस्कार आपले स्वागत आहे. मी पुस्तके आणि मित्रांवर पैसे खर्च करतो,माझ्याकडे दगड आणि विटांवर खर्च करण्यासाठी पैसे नाहीत.- रस्किन बाँड.ही थोर माणसं व त्यांचे विचार मला पुस्तकात भेटलीत.ती भेटली आणि त्यांनी सांगितले कि, प्रत्येक दिवशी असं काही तरी करा की,ते तुम्हाला अधिक सुंदर उद्याच्या दिशेने खूप लांबवर घेऊन जाईल."- डोग फायरबाऊ.' सर्वियन कादंबरीकार मिलोराद पावीच यांचे एक वाक्य आहे ते म्हणतात - जोवर जगात पुस्तक वाचणाऱ्या वाचकांची संख्या बंदूकधारी सैनिका पेक्षा अधिक आहे तोवर काळजीच काहीच कारण नाही.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात.पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये.म्हणून अविरतपणे प्रयत्न करणारे मार्गदर्शक, मित्र धावून येतात.प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,डॉ.दीपक शेटे,आ.भरत बुटाले,प्रा.सर्जेराव राऊत,सुभाष ढगे,अनिल फारणे,डॉ.सुधीर सरवदे ,विश्वास खाडे, विनायक पाटील,संजय कुंभार,सतीश खाडे,मनोहर सुर्वे,गणेश खंदारे,तात्या गाडेकर, दादासाहेब गाडेकर, दादासाहेब ताजणे, पुस्तकातील घटना प्रसंग सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील यांनी केलेले आहे. मला लिहिण्याची प्रेरणा देणारी पुस्तके,लेखक,प्रकाशक,मित्र ही जगावेगळी माणसं माझ्या जीवनातील महत्वाचा टप्पा आहेत.... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ.मेघा गायकवाड, चिरंजीव मयान,माझ्या धावण्यातील गुरुवर्य नामदेव बरुरे,लुल्ला शेख मोठी ताई ,लहान ताई जयश्री शिंदे या सर्वांचेच मनापासून आभार व धन्यवाद मॅट्रिक फेल विजय गायकवाड

6/24/26

संस्कृतीची बांधणी / The construction of culture

तीनशे वर्षापूर्वी - पन्नास वर्षे आगे मागे म्हणा हवे तर एक स्फोट झाला आणि त्याने साऱ्या भूतलावर आघात करणाऱ्या जबरदस्त धक्कादायक लाटा इतस्ततः झुगारल्या,आणि जुन्या समाजसंस्था मोडूनतोडून एक पूर्णतः नवीन संस्कृती घडवली.अर्थात हा स्फोट म्हणजे औद्योगिक क्रांती.त्याने साऱ्या जगात उठविलेल्या लाटा राक्षसी ताकदीच्या असून त्यांनी पूर्वीच्या प्रचलित असलेल्या सर्व संस्थांवर धडक मारली. ह्या 'दुसऱ्या लाटेने' लाखो लोकांचा जीवनक्रमच बदलून टाकला.

पहिल्या लाटेची संस्कृती जेव्हा अधिकारारूढ होती,त्या हजारो वर्षे व्यापणाऱ्या प्रदीर्घ कालखंडात पृथ्वीवर अस्तित्वात असलेल्या लोकांचे दोन प्रकारात विभाजन करता येत होते:अतिशय प्राचीन काळच्या मानवाच्या धाटणीतच राहिलेला मागास,आदिमानव,आदिवासी हा एक प्रकार,आणि दुसरा प्रकार म्हणजे 'सुसंस्कृत' 'नागर मानव.तथाकथित आदिवासी छोटे गट बनवून किवा टोळया तयार करून एकत्र येणे,शिकार करणे, मासेमारी करणे यातच गुंतून राहिले आणि म्हणून शेतीने केलेल्या क्रांतीने त्याला मागे टाकले.

या उलट 'सुसंस्कृत' जग म्हणजे मुख्यतःपृथ्वीच्या ज्या भागावर लोकांनी जमिनीवर मशागत करणे स्वीकारले, तो भाग होय.कारण जेथे शेती अस्तित्वात येऊन तिचा विकास झाला,त्या ठिकाणी संस्कृतीने मूळ धरले.चीन व भारत यांपासून बेनिन व मेक्सिको, ग्रीस व रोममध्ये संस्कृती उदयाला आल्या,आणि कोसळल्या.झगडे होत राहिले,वितळून जाऊन सांधे जुळलेही आणि असे घडत घडत वेगळेच आकर्षक मिश्रण निर्माण होत राहिले.

तथापि,त्यांच्या वैविध्यामागे,विरोधामागे मूलभूत साम्येच अस्तित्वात होती त्या सर्वामध्ये,अर्थव्यवस्थेचा पाया 'जमिनीवर आधारलेला होता आणि जीवन खेड्यांभोवतीच गुंफले गेलेले होते.त्या सर्वांमध्ये कामाची,श्रमाची साधी सरळ विमागणी अस्तित्वात होती आणि काही स्पष्ट स्वरुपाच्या जाति आणि वर्ग यांचा उदय झाला.खानदान,पौरोहित्य,योध्ये,दलित, गुलाम किंवा वेठबिगार.त्या सर्वामध्ये फक्त सामर्थ्यवानच श्रेष्ठ ठरत होता,'अधिकारी' होत होता. त्या सर्वांमध्ये मनुष्याच्या जन्मानुसारच त्याचे समाजातील स्थान ठरत होते.त्या सर्वांमध्ये अर्थव्यवस्था विकेंद्रित होती,त्यामुळे प्रत्येक जमात आपणास आवश्यक असणाऱ्या वस्तू निर्माण करत होती.

याला काही अपवाद होतेच इतिहासात काहीच कधी साचे सरळ,ठोकळेबाज असू शकत नाही काही व्यापारी संस्कृतीही अस्तित्वात होत्या.नाविक लोक व्यापारासाठी समुद्र पार करुन जात होते.काही अतिशय केंद्रीभूत अशी राज्ये होती.तेथील राज्यसत्ता प्रचंड पाणीपुरवठा योजना तयार करीत असत.परंतु असे काही फरक असूनही,या विशिष्ट वाटणाऱ्या संस्कृतीचे खास असे मूल्यमापन करुनही आपण असे म्हणू शकतो की पहिल्या लाटेने जी संस्कृती सर्वभर पसरवली ती शेती संस्कृतीच होय.

ह्या संस्कृतीचा प्रभाव असताना कधीकधी भावी घटनांच्या सूचनाही मिळत होत्या ! जुन्या ग्रीस व रोममध्ये अपरिणत अवस्थेतील,मोठ्या प्रमाणात उत्पादन करणारे,काही कारखाने निर्माण झाले होते. इ.स.पूर्व ४०० या काळात एका ग्रीक बेटात तेल (जमिनीतील) उपसून काढले जात होते.

ब्रह्मदेशातही इ.स.१०० या काळात हे शक्य झाले होते.बाबिलोनिया आणि इजिप्त या देशात मोठ्या प्रमाणात नोकरशाह्या फोफावल्या होत्या.आशिया आणि दक्षिण अमेरिकेत मोठी केंद्रे ठरतील अशा अनेक शहराची निर्मितीही झाली होती.तेथे पैसे आणि चलनी स्वरुपातील विनिमयही होत होता.कॅथेपासून कॅलाइसपर्यंत व्यापाराच्या मार्गाची जाळी वाळवंटे समुद्र आणि पर्वतराजी यांतून पसरलेली होती.शिवाय बाल्यावस्थेतील नगरपालिका आणि प्राथमिक अवस्थेतील राष्ट्रेही अस्तित्वात होती.प्राचीन अलेक्झांड्रियामध्ये खरोखरच आश्चर्यकारक ठरेल अशी एक गोष्ट अस्तित्वात होती,तो म्हणजे वाफेच्या इंजिनाचे आदिस्वरुप !

तरी देखील ज्याला दूरान्वयानेही औद्योगिक संस्कृती म्हणता येईल असे काहीही तेव्हा अस्तित्वात नव्हते. ज्यांना भविष्यकाळातील चुणुका म्हणता येतील अशा वरील काही गोष्टी म्हणजे इतिहास काळातील विक्षिप्त घटनाच म्हणावयास हव्यात.त्या देखील वेगळाल्या ठिकाणी आणि वेगवेगळया काळात अशा तुटकपणे विखुरल्या गेल्या असल्याचे ध्यानात येईल.त्या कधीही सुसूत्र पध्दतीत एकत्र आणल्या गेल्या नव्हत्या;त्या तशा आणता आल्याही नसत्या.म्हणून आपण इ. स. १६५०-१७५० पर्यंतच्या जगाला पहिल्या लाटेचे जग म्हणू शकतो.प्राचीनपणाच्या काही अपवादांच्या आणि औद्योगिक भविष्याच्या सूचना देणाऱ्या काही घटनांचा विचार करुनही आपण असे म्हणू शकतो,की शेती संस्कृतीनेच या काळात पृथ्वीवर प्रभुत्व होते, आणि जणू काही ते तसेच कायम रहाणार आहे असा भास तरी होत होता;

आणि अशा या जगात औद्योगिक क्रांतीचा उद्रेक झाला. आणि एक मोठी प्रचंड सांस्कृतिक लाट उसळली. आणि तिने एक विचित्र,समर्थ आणि वेडया ताकदीची अशी प्रतिसंस्कृती निर्माण केली.हा औद्योगिकपणा म्हणजे धुराडी आणि यत्रांची जुळणी यांच्याहून खूप काही अधिक असा होता. मानवी जीवनाच्या प्रत्येक भागाला स्पर्श करुन जाणारी अशी ती एक विविधांगी समाजपध्दती होती,आणि तिने पहिल्या लाटेच्या प्रत्येक वैशिष्ट्यावर हल्लाही चढविलेला होता.तिने डेट्रॉइटच्या बाहेर प्रसिध्द विलो रन ही मोठी फॅक्टरी काढली,परंतु तिने शेतावर ट्रॅक्टरची योजन ही केली,ऑफिसमध्ये टाइपरायटर आणि स्वयंपाक घरात रेफ्रिजरेटर बसविला.तिने दैनिक वृत्तपत्रे निर्माण केली.सिनेमाला जन्म दिला,जमिनी खालून जाणाऱ्या गाड्या व डी सी-३ प्रकारची विमाने दिली, त्रिमिति दिली,बारासुरी संगीत दिले,बाँहोस इमारती दिल्या.बार्सेलोना खुर्ष्या दिल्या,बैठे संप दिले, जीवनसत्वांच्या गोळ्या दिल्या,जीवनमर्यादा वाढवून दिली.मनगटी घड्याळे आणि मतपेट्यांना जागतिक पातळीवरील अस्तित्व दिले.आणि अधिक महत्त्वाची गोष्ट ही की या सर्व गोष्टींना एकमेकींशी जोडून दिले. एखाद्या यंत्राप्रमाणे त्यांचा संयोग केला.आणि त्यायोगे आजवरच्या जगातील सर्वात सामर्थ्यशाली सुसंघटित व्याफक समाजपद्धतीची रचना केली.दुसरी लाट-संस्कृतीची.

हिंसामय' उत्तर

ही दुसरी लाट पसरत पसरत वेगवेगळ्या समाजांना जाऊन भिडत असताना जुन्या लुप्तमान शेती संस्कृतीचे रक्षणकर्ते आणि औद्योगिक भविष्याचे कैवारी यांच्यात दीर्घकाळपर्यंत रक्तरंजित लढा होत गेला.पहिल्या आणि दुसऱ्या लाटेचे पाईक एकमेकांवर तुटून पडत.टकरा घेत असताना मधेच येणारे आदि संस्कृतीचे आदिवासी बाजूला सारले गेले; त्यांचा मोठ्या प्रमाणात नाश झाला.

अमेरिकेत,शेती संस्कृती स्थापून तिचा विस्तार करण्याचे धोरण ठरवून युरोपियनांनी आगमन केले,तेव्हा है विरोध,हया टकरी सुरु झाल्या.एक गोरी निष्ठुर शेतीप्रधान लाट,इंडियन लोकांना नागवत,त्यांच्याकडून ताबा मिळवत शेतांची स्थापना करत,शेतीप्रधान गावं वसवत पुढे पुढे सरकत धडाक्याने पॅसिफिककडे चालली आणि त्याला जाऊन भिडलीही !

परंतु दुसऱ्या लाटेच्या दूतांनी या सुस्थित शेतक-यांची अशीच दशा उडवून दिली.न्यू इंग्लंड आणि मध्य अटलांटिक राज्यात कारखाने आणि शहरे वेगाने आपला पसारा मांडू लागली.एकोणीसाव्या शतकाच्या मध्याच्या सुमाराला ईशान्य भागात मोठ्या वेगात औद्योगिक विभागाची वाढ होत गेली.पिस्तुले,घडयाळे, शेती औजारे कापडनिर्मिती,शिवण यंत्रे आणि इतर वस्तू निर्माण करणारे कारखाने उभे राहिले.देशाचा इतर भाग मात्र अजूनही शेतीच्या आधिपत्याखाली होता.पहिल्या आणि दुसन्या लाटेच्या ताकदींमध्ये आर्थिक आणि सामाजिक तणाव तीव्रतेने वाढत गेले.इतके,की इ. स.१८६१ मध्ये दोघांत सशस्त्र भडके उडाले.

अनेकांना वाटले त्याप्रमाणे यादवी युद्ध गुलामीसारख्या नैतिक विषयावरुन किवा जकातीसारख्या लहान आर्थिक विषयावरून लढले गेले नव्हते.ते एका फार मोठ्या प्रश्नावरुन लढले गेले होते.तो प्रश्न असा होता, की हा नवा श्रीमंत खंड कोणाच्या सत्तेखाली असावा ? शेतक-यांच्या का उद्योजकांच्या ? पहिल्या लाटेच्या? की दुसऱ्या ? त्याच प्रमाणे प्रश्नाचे स्वरुप असेही होते, की भावी अमेरिकन समाज मूलतः शेतीप्रधान असावा की उद्योगप्रधान ? उत्तरेकडील सैन्याच्या विजयानंतर मग साचा निश्चित झाला आणि अमेरिकन संयुक्त संस्थानांचे औद्योगिकीकरण निश्चित झाले.मग त्या वेळे नंतर अर्थकारणात,राजकारणात,सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनात शेतीची पीछेहाट होत गेली आणि उद्योगांची भरभराट होत राहिली.रोरावत येणान्या दुसऱ्या लाटेने पहिलीला ओहोटी दाखवली !

दोन सस्कृतींच्या अशाच चकमकी इतरत्र देखील उठल्या.जपानमध्ये इ.स. १८६८ मध्ये सुरु झालेले मेरजी रेस्टोरेशन म्हणजे जपानी ढंगात लढला गेलेला शेतीमय इतिहास आणि उद्योगमय भविष्य यांच्यातला तोच झगडा होय. इ.स. १८७६ पर्यंत झालेला सरंजामशाहीचा निःपात इ. स. १८७७ मध्ये झालेले सात्सुमा वंशाचे बंड, इ.स १८८९ मध्ये, स्वीकारलेली पाश्चिमात्य ढंगाची रचना,या सर्व गोष्टी म्हणजे पहिल्या आणि दुसऱ्या लाटांच्या संघर्षाची परावर्तनेच होत.जपानने प्राप्त केलेल्या औद्योगिक सत्तेतील अग्रस्थानाच्या दृष्टीने पडलेली ही पहिली पावले म्हणावी लागतील.

रशियात देखील पहिल्या आणि दुसऱ्या लाटेतील संघर्ष उद्भवले.इ.स.१९१७ मध्ये झालेली रशियातील क्रांती म्हणजे अमेरिकन यादवी युद्धाची पुनरावृत्ती.प्रथम वाटले त्याप्रमाणे सुरुवातीला लढा साम्यवादावरुनच झाला.परंतु नंतर मात्र तो औद्योगिकीकरणावरुनच झाला.ज्यावेळी बोल्शेविकांनी वेठबिगारी आणि सरंजामी साम्राज्याचे उरलेसुरले अवशेष निपट्न काढताना शेतीला मागे सारले आणि त्याचवेळी औद्योगिकीकरणाला गती दिली.ते दुसऱ्या लाटेच्या पक्षाचे झाले.एकामागून एका देशात हाच पहिल्या आणि दुसऱ्या लाटेच्या पक्षपात्यांमधका झगडा फुटत राहिला आणि त्यामुळेच राजकीय पेच व उलथापालथी, संप,उठान,लष्करी क्रांत्या आणि लढाया निर्माण होत राहिल्या

आज उत्तर गोलार्धात पंचविसाव्या आणि पासष्ठाव्या अक्षांशांच्या दरम्यान औद्यौगिक पट्ट्याने पृथ्त्री वेढली आहे उत्तर अमेरिकेत सुमारे २५० दशलक्ष लोक उद्योग प्रधान जीवनपद्धती अवलंबीत आहेत.पश्चिम युरोपात,स्कैंडिनेव्हिया ते दक्षिणेकडील इटलीपर्यंत, आणखी अब्जावधी लोकांनी हीच जीवनपद्धती अंगिकारली आहे.याच्या पूर्वेला युरेशियन प्रदेश म्हणजे युरोपाचा पूर्व भाग आणि रशियाचा पश्चिम भाग आहे आणि या प्रदेशातही तेवढेच लोक उद्योगप्रधान समाजाचा भाग बनून जगत आहेत,असे आपल्याला आढळून येईल.आणि शेवटी आपण आशियाच्या औद्योगिक भागात येऊन ठेपतो.जपान,हाँगकाँग, सिंगापूर,तैवान,ऑस्ट्रेलिया, न्यू झिलंड आणि दक्षिण कोरियाचे तसेच चीनचे काही भाग याच्या आवाक्यात येतात.येथेही अब्जावधी लोकांनी 'उद्योगा'चा आसरा घेतलेला आपल्याला आढळून येईल.एकूण,जगातील सुमारे एक चतुर्थाग लोकांना औद्योगिक संस्कृतीने अंकित केलेले आहे. (या विभागात सर्वसाधारणपणे मेक्सिकोमधील मेक्सिको सिटी,भारतातील मुंबई अशा आणखीही बऱ्याच ठिकाणांचा अंतर्भाव करता येईल)

भाषा, संस्कृति, इतिहास, राजकारण यांचे तीव्र भेद असूनही हे भेद इतके तीव्र आहेत,की त्या बाबींवरुनच युद्धे खेळलो गेली आहेत.ह्या सर्व,दुसऱ्या लाटेने प्रभावित केलेल्या समाजाची काही समान अंगेही आहेत.खरेच,या सर्व प्रख्यात भेदांच्या मागे गुप्तरुपाने साम्याचे तळ ठाण मांडून आहत.

आणि आजच्या टक्कर घेणा-या बदलाच्या लाटा समजण्यासाठी आपल्याला सर्व उद्योगप्रधान देशातील समाजरचनांची ओळख पटणे आवश्यक आहे.कारण दुसऱ्या लाटेच्या संस्कृतीचा हाच अव्यक्त सांगाडा आहे. कारण खुद्द हीच ओद्योगिक चौकट आता हादरत आहे !

सजीव विजेत्र्या

कोणत्याही संस्कृतीची पूर्वपीठिका म्हणजे उत्साह, शक्ती ही असते.मग तो संस्कृती जुनी असो की नवी.पहिली लाट-समाज आपली शक्ती सजीव विजेऱ्यांकडून मिळवीत असत-मानवी किंवा प्राण्यांच्या स्नायु बळांपासून,किंवा सूर्य,वारा आणि पाणी यांच्या पासूनही मिळवत असत.अन्न शिजवण्यासाठी आणि उष्णता निर्माण करण्यासाठी जंगले तोडली जात,पाणचक्यांनी (यातील काही भरतीच्या लाटांमुळे चाललेल्या ) गिरण्यांच्या तळया चालवल्या,तसेच शेतांमध्ये पवनचक्या करकरू लागल्या.प्राण्यांनी नांगर ओढले. फ्रेंच राज्यक्रांतीपर्यंतच्या काळात,युरोप आपणाला हवी असलेली शक्ती सुमारे १४ दशलक्ष घोडे व सुमारे २४ दशलक्ष बैल यांच्यापासून मिळवत होता, असे अनुमान आहे.याप्रमाणे सर्व पहिली लाट संस्कृतीच्या समाजांनी नूतनीकरण करता येण्याजोग्या शक्ति उगमांचा पुरेपूर वापर करुन घेतला.या लोकांनी तोडलेली जंगले निसर्ग पुनः उगवू शकत होता.शिडे भरणारे वारे भरून निघत होते.चाके फिरवणारे पाणी नद्यांमध्ये पुनः येत होते फार कशाला,शक्ती पुरवणारे गुलाम मानव आणि प्राणी या दोन्ही प्रकारचे देखील जागा मोकळी राहू देत नव्हते!

या उलट दुसऱ्या लाटेचा अंगिकार करणाऱ्या सर्व समाजांनी आपणाला हवी असणारी ऊर्जा,कोळसा,

वायु,तेल या पुनः भरून काढता न येणाऱ्या खडकजन्य इंधनाचा वापर करून मिळवायला सुरुवात केली.हा क्रांतिकारक बदल इ.स. १७१२ मुध्ये न्यू कोमेन याने अति उपयुक्त वाफेच्या इंजिनाचा शोध लावल्यानंतर घडला.आणि याचा अर्थ असा झाला,की निसर्गसंपत्तीने पुरविलेल्या भांडवलावरील व्याज वापरण्याचे सोडून या संस्कृतीने खुद्द भांडवलाचाव घास घ्यायला सुरुवात केली.पण अशा तन्हेने पृथ्वीच्या पोटात दडलेले ऊर्जासाठे खणणे ही गोष्ट औद्योगिक संस्कृतीला मिळालेले मोठेच सहाय्य ठरले आणि त्यामळे तिच्या आर्थिक भरभराटीचा वेग वाढला.आणि मग त्या क्षणानंतर आतापर्यंत जिथे जिथे म्हणून दुसरी लाट जाऊन पोचली तेथील देशांनी उत्तुंग तांत्रिक आणि आर्थिक इमले अशा समजुतीवर उभारले,की ही भूगर्भीय संपत्ती आपल्याला अखंड मिळतच रहाणार आहे.

पूर्वेकडील आणि पश्चिमेकडील समाजवादी, त्याचप्रमाणे भांडवलशाही समाजांकडून हेच धोरण अवलंबिले गेले-विखुरलेली किंवा केंद्रीभूत शक्ती,संपून जाणारी आणि पुनः भरुन येऊ शकणारी शक्ती,अनेक निरनिराळया ठिकाणांतून मिळणारी शक्ती मिळवत रहाणे,वापरत रहाणे.भूगर्भीय ऊर्जा हा दुसन्या लाटेच्या अंमलाखालील सर्व समाजांचा जणू पायाच ठरून गेला.

तंत्रज्ञानाचे उदर

नव्या ऊर्जापद्धतीकडे घेतलेल्या ह्या उडीच्या जोडीनेच तंत्रज्ञानाच्या दिशेने होणारी प्रगतीही फार मोठ्या वेगात व प्रमाणात होत होती.व्हिट्ट व्हिअसने सुमारे दोन हजार वर्षांपूर्वी ज्यांना ' आवश्यक शोध' म्हटले होते, त्यांच्यावर पहिल्या लाटेतील समाजाने भर दिला होता. सुरुवातीच्या काळातील रहाट,तरफ,द्राक्षे गाळण्याची यंत्रे.बेचक्या,कप्प्या,याऱ्या ह्या गोष्टी केवळ मानवाच्या आणि प्राण्यांच्या शक्ती अधिक वाढवण्यासाठीच मुख्यतः वापरण्यात येत होत्या.

दुसऱ्या लाटेने तंत्रज्ञान वेगळ्याच अशा नव्या पातळीवर नेऊन ठेवले.तिने विजेवर चालणाऱ्या,हलणाऱ्या विभागांची,पट्ट्यांची,नळाची,बेरिग्जची,नट,बोल्टें यांची फार मोठ्या प्रमाणात वीण केली.ह्या सर्वांनी आपल्या दातेरी चाकांवर फिरत कडकडाट,गडगडाट उठवणे अव्याहत चालू ठेवले.मानवाच्या किंवा प्राण्याच्या ताकदीला जोड देण्यापेक्षा कितीतरी अधिक कार्य या नव्या यंत्रांनी केले.ह्या ओद्योगिक संस्कृतीने ज्ञानेंद्रिये तयार केली.अधिक अचूकपणे ऐकू शकणारी,पाहू शकणारी,स्पर्श करू शकणारी यंत्रे तयार केली. मनुष्यप्राण्यापेक्षा कितीतरी अचूक आणि निःसंदिग्धपणे ज्ञान प्राप्त करण्याची त्यांची कुवत मोठी आहे.ह्या संस्कृतीने तंत्रज्ञानाला एक असे उदर बहाल केले,की ज्याच्यातून नवीन यंत्रांना जन्म देण्याचा क्रम चालूच ठेवणारी अशी यंत्रे तयार झाली.उदा. यंत्रांचे सुटे भाग तयार करणे इत्यादी.यापेक्षा महत्वाची गोष्ट म्हणजे एकमेकांशी संबंधित,एकमेकांवर अवलंबित अशी एक प्रकारची साखळी तयार करणारी यंत्रे एकाच छपराखाली आणून मोठाले कारखाने या संस्कृतीने उभे केले….!!! तिसरी लाट अलविन टॉफलेर यांच्या Third Wave या पुस्तकाचा अनुवाद शरदिनी मोहिते यांनी केला आहे तर,प्रकाशक महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ पुणे.

हा भाग तीन लेखामध्ये प्रकाशित केला जाईल.

6/22/26

वेळेचं भान / sense of time

पृथ्वीतलावरील अनेक अक्षांश प्रदेशात साधारण शरद ऋतूमध्ये पानझड होते आणि वसंतात नवीन पालवी फुटते.आपण हे गृहीतच धरलेलं असतं.पण जरा निरखून बघितलं तर हे एक मोठं गूढच आहे.कारण असं होण्यासाठी झाडांना वेळेचं भान हवं.हिवाळा येत आहे हे त्यांना कसं कळतं? किंवा वाढलेली उष्णता ही तात्पुरती नाही तर वसंत ऋतूचे आगमन होत आहे,हे तरी कसं कळतं ?

उबदार दिवसात झाड आपल्या पानांची वाढ करतं हे तर्कशुद्ध आहे,कारण खोडातील द्रव्य वितळले तरच पुन्हा त्याचा प्रवाह सुरू होतो.पण जेव्हा हिवाळा जास्त कडक असतो तेव्हा पानं लवकर उमलतात,हे मात्र आश्चर्यकारक आहे.टेक्निकल युनिव्हर्सिटी ऑफ म्युनिकच्या शास्त्रज्ञांनी या घटनेचा हवामान नियंत्रित प्रयोगशाळेत शोध घेतला.हिवाळा थोडाजरी कमी थंड असला तरी बीचच्या फांद्यांना उशिरा पालवी फुटत होती.प्रथमदर्शनी त्यांना हे तर्कहीन वाटलं,कारण जास्त गरमी असलेल्या वर्षांमध्ये वाइल्ड फ्लावर सारखी अनेक वनस्पतींची वाढ जानेवारीतच सुरू होते आणि काही काहींना फुलेही धरतात.अनेकदा याची बातमी वृत्तपत्रातून येते.कदाचित असे असेल की प्रचंड गारठा असेल तरच झाडांना गाढ झोप मिळते.अशी प्रफुल्लित करणारी गाढ झोप नाही मिळाली तर वसंतात ते लगेच कामाला लागू शकत नाहीत.कारण काहीही असो. हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर हा एक तोटाच आहे, कारण इतर प्रजाती अशा प्रकारे थकलेल्या नसतात. आपली पालवी ते लगेच वाढवू लागतात आणि शर्यतीत पुढे जातात.

जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये उबदार वातावरण आपण अनेकदा अनुभवलं आहे.तेव्हा ओक किंवा बीचला पालवी फुटलेली नसते.अजून वाढीला सुरुवात करायची नाही,हे त्यांना कुठून कळतं? हे कोडं आपल्याला सुटू लागलं आहे,किमान फळं लागणाऱ्या झाडांचे तरी. झाडांना मोजता येतं हे आता आपल्या लक्षात येत आहे! काही ठरावीक उष्ण दिवस गेले की मगच वसंत ऋतूच्या आगमनाची खात्री झाडांना पटते.पण फक्त उबदार दिवसांनीच वसंत ऋतू आले,असं मानलं जात नाही.पानझड आणि नवीन पालवी फुटणे या दोन्ही गोष्टी जशा तापमानावर अवलंबून असतात तशा दिवसाच्या लांबीवरही असतात.

उदाहरणार्थ,दिवसातले किमान तेरा तास उजेड असला की मगच बीच वृक्ष नवीन पालवी सुरू करतात.हे फारच आश्चर्यकारक आहे,कारण असे करण्यासाठी झाडांना कोणत्यातरी प्रकारची दृष्टी पाहिजे.त्या दृष्टीचा शोध पानातच घेणं योग्य ठरतं.कारण त्यांच्यामध्ये सौर ऊर्जा झेलण्यासाठी जणू एक यंत्रच असते.

उन्हाळ्यात झाड सौर ऊर्जा घेत राहतात पण एप्रिलमध्ये अजून पालवी फुटलेली नसते.हे गुपित आपल्याला नीट कळलं नाही, पण बहुधा ही क्षमता कोंबांमध्येसुद्धा असते.कोंबांमध्ये पानं घडी घातलेल्या अवस्थेत शांतपणे बसलेली असतात.ती सुकून जाऊ नये म्हणून त्यांच्यावर तपकिरी रंगाचे आवरण असते.पानं वाढू लागली की या आवरणाकडे नीट बघा.त्याला प्रकाशासमोर धरले की ते पारदर्शक असल्याचे जाणवेल.अगदी थोडा सूर्यप्रकाश असला तरी त्यावरून दिवस किती मोठा आहे ते खोडांना,कोंबांना कळून चुकते.ही क्षमता तर शेतात उगवणाऱ्या काही तणांनाही असते.थोडा चंद्रप्रकाश जरी पडला तरी त्यांच्या बिया रुजायला सुरुवात होते. अशाच प्रकारे झाडाच्या खोडांनाही सूर्यप्रकाश पडल्याचे जाणवते.बहुतांश झाडांच्या खोडामध्ये निद्रावस्थेत असलेले कोंब असतात.आपला शेजारी वठून पडला की झाडाला अधिक ऊन मिळू लागते आणि मग हे कोंब बाहेर पडून प्रकाशाचा फायदा घ्यायला सज्ज होतात.

द हिडन लाईफ ऑफ ट्रीज

पी ट र वो ह्ल ले बे न

अनुवाद - गुरुदास नूलकर

अरविंद घनश्याम पाटकर

 मनोविकास प्रकाशन

पण गरमीचे दिवस वसंत ऋतूचे आहे आणि उन्हाळ्याचा शेवट नाही हे झाडांना कळतं कसं ? तापमान आणि दिवसाची लांबी या दोन्हीच्या आधाराने झाडाला हे जाणवतं.तापमानात वाढ होते तो वसंत ऋतू.तापमान घटू लागते तेव्हा शरदऋतू हेही झाडांना माहीत असते.आणि म्हणूनच उत्तर गोलार्धावरील ओक किंवा

बीच वृक्ष जेव्हा आपण दक्षिण गोलार्धात वसलेल्या न्यू झीलंडला निर्यात करतो तेव्हा ही झाडं तिथल्या उलट ऋतूचक्राशी अनुकूलन करून घेतात. आणि हो,झाडांना स्मरणशक्ती असते हेही यातून सिद्ध होते.नाहीतर त्यांना दिवसाची लांबी किंवा गरमीचे दिवस कसे मोजता येतील?

शरद ऋतूत जर का उष्णता नेहमीपेक्षा जास्त वाढली तर मात्र झाडं गोंधळून जातात.सप्टेंबर महिन्यातच त्यांचे कोंब वाढू लागतात आणि काही झाडांवर चक्क नवीन पालवी धरते.हिवाळा उशिराने आला की या गोंधळलेल्या झाडांना मात्र त्याचे परिणाम भोगावे लागतात.या नव्याने वाढलेल्या रोपट्यांचे लाकूड टणक न झाल्यामुळे ते थंडीचा मुकाबला करण्यासाठी तयार नसतात,आणि त्यांच्याबरोबर पानंही हतबल असतात. आणि मग पानांची हिरवाई गोठून जाते.हे झाडांना नक्कीच दुःखदायक असणार.आणि त्याहून वाईट म्हणजे हे कोंब निकामी झाले की पुढच्या वसंतात पुन्हा नवीन कोंब करण्यासाठी ऊर्जा खर्च करावी लागते. झाडाने सावधगिरी बाळगली नाही तर ते अशक्त राहून येणाऱ्या ऋतूचा सामना करणे त्यांना मुष्कील जाते.

पालवी फुटण्याची वेळ ठरविण्याव्यतिरिक्तही झाडांना वेळेचे भान असणे गरजेचे असते.विशेषतः प्रजननात हे महत्त्वाचे असते.

त्यांच्या बिया जर शरद ऋतूत जमिनीवर पडल्या तर त्या लगेच रुजणे अपेक्षित नाही. तसं झालं तर दोन समस्या निर्माण होतात.पहिली समस्या, नाजूक कोंबांना टणक होण्यास वेळ मिळालेला नसतो म्हणून ते गारठून जातात.आणि दुसरं म्हणजे थंडीच्या काळात हरणांना खाद्य कमी असल्यामुळे ते या ताज्या हिरव्या कोंबांवर तुटून पडतात.म्हणून इतर सर्वांबरोबर वसंत ऋतूमध्ये रुजणे हेच शहाणपणाचे असते.त्यासाठी बियांना थंडीची जाणीव असते.उष्ण दिवस सलग आले की मगच ही पिल्ले आपल्या सुरक्षा कवचातून बाहेर पडतात. झाडांसारखी व्यवस्थित मोजण्याची क्षमता अनेक बियांना नसते आणि म्हणून खारी किंवा 'जे' पक्षी जेव्हा बीचचे दाणे एखाद-दोन इंच जमिनीत पुरतात तेव्हा त्यांचे फावते.जमिनीच्या या भागात वसंत ऋतूचे पूर्ण आगमन झाल्याशिवाय ऊब नसते.बर्च सारख्या हलक्या बियांना मात्र जास्त लक्ष द्यावे लागते.त्यांच्या पंखांच्या साहाय्याने ते जमिनीवर पोचून शांतपणे वाट पाहात पडलेले असतात.ते कुठे पडतात,यावर त्यांना भरपूर सूर्यप्रकाश मिळेल की पालकांसारखे त्यांनाही सबुरीने 'त्या' दिवसाची वाट पाहावी लागेल हे ठरते.

प्रश्न चारित्र्याचा..!!

'ह्यूमेल' या माझ्या गावातून 'आहर' दरीकडे जाणाऱ्या रस्त्यावर तीन ओक वृक्ष आहेत.भारदस्तपणे ते तिथे उभे आहेत आणि म्हणून या भागाला त्यांच्या नावाने सन्मानित केले आहे.सुमारे शंभर वर्ष जुन्या असलेल्या या वृक्षांमध्ये जेमतेम काही इंच अंतर आहे.हे जरा विलक्षण आहे आणि याचा अभ्यास करण्याची मला चांगली संधी आहे.

कारण तीनही वृक्ष अगदी एकसारख्या पर्यावरणीय परिस्थितीत वाढले आहेत.काही यार्डाच्या अंतरावर जमीन,पाणी आणि सूक्ष्म हवामान वेगळे असणे शक्य नाही.म्हणजे जर या तीन वृक्षात काही फरक असला तर तो त्यांच्या अंगभूत गुणधर्मामुळे असणार.आणि या तिघांचेही आचरण वेगळे आहेच!

हे वृक्ष थंडीत बोडके असताना किंवा उन्हाळ्यात गर्द पालवीने भरलेले असताना कुणी धावत्या गाडीतून यांच्याकडे पाहिले तर हे तीन वृक्ष आहेत,हे जाणवणारच नाही.जवळ असल्यामुळे हा एकच डेरा असल्याचे भासते आणि तिन्ही खोडं एकाच मुळापासून निघाल्यासारखे वाटते.छाटलेली झाडे पुन्हा उगवताना काही वेळा असे होते.पण तिन्ही ओक वृक्ष शरद ऋतूत वेगवेगळे रंग धारण करतात.उजवीकडचा ओक जेव्हा रंग बदलायला लागतो तेव्हा मधला आणि डावीकडचा अजून हिरवाच असतो.या दोन आळशी झाडांना आपल्या मित्रासारखे निष्क्रिय होण्यासाठी अजून दोन आठवडे तरी लागणार असतात.पण जर ते एकाच परिस्थितीत वाढतात तर मग त्यांच्या वागणुकीत हा फरक कुठून येतो? यावरून असं दिसतं की,पानं झडण्याची वेळ स्वभावाप्रमाणे बदलते.आधीच्या प्रकरणात पाहिल्याप्रमाणे पानझडी वृक्षांना आपली पाने झडून टाकावी लागतात.पण त्याची बरोबर वेळ कोणती? झाडांना थंडी पडण्याची बरोबर वेळ माहीत नसते.हिवाळा कडक असणार का सौम्य तेही ठाऊक नसते.त्यांना फक्त दिवस लहान होत चालल्याची आणि तापमान घटत असल्याची जाणीव होते.पण शरद ऋतूतले काही दिवस असाधारणपणे उष्ण असतात. अशा वेळेस मात्र ओक वृक्ष संभ्रमात पडतात.या हवेत प्रकाश संश्लेषण करून थोडी जास्त ऊर्जा आणि साखर बनवून ठेवायची का? की कधीही हिमवृष्टी होऊ शकेल याची सावधगिरी बाळगून पानं झडून टाकायची? या समस्येचे निवारण प्रत्येक झाड वेगळ्या पद्धतीने करत असल्याचे स्पष्ट दिसते.

उजवीकडचे झाड जरा जास्त चिंता करणारे आहे किंवा अधिक समजूतदार आहे म्हणू या.पानझड करता आली नाही आणि पूर्ण हिवाळा मरणाच्या भीतीत घालवावा लागला तर जास्त अन्नसाठा पुरवठा करून ठेवण्याचा काय फायदा? म्हणून ते वेळच्या वेळी पानझड करून स्वप्नांच्या जगात पाऊल ठेवते.पण इतर दोन वृक्ष मात्र जरा जास्त धीट आहेत.पुढला वसंत ऋतू कसा असेल किंवा कीटकांनी आक्रमण करून ऊर्जा संपवली तर खिशात काय राहणार,असा विचार करून ते अधिक काळ हिरवे कपडे घालून असतात.आणि सालापासून मुळापर्यंत जमेल तिथे तुडुंब साठा भरून ठेवतात. आजपर्यंत तरी त्यांच्या या आचरणाचा त्यांना फायदाच झालेला आहे,पण हे किती काळ चालेल कोणास ठाऊक? जागतिक तापमान बदलामुळे शरदातील तापमान जास्त काळ टिकते आणि यांची पानं धरून ठेवण्याची युक्ती नोव्हेंबरपर्यंत फायदेशीर ठरते.पण याच काळात शरदातील वादळे न चुकता येत राहतात. यामध्ये पानांनी भरलेले झाड पडण्याचा धोका जास्त असतो.माझ्या अंदाजाप्रमाणे अशा वेळेस सावधानता बाळगणारी झाडं जगण्याची शक्यता जास्त असते.

पानझडी वृक्ष आणि सिल्वर फरच्या खोडावर असेच काही तरी दिसून येते.झाडांच्या शिष्टाचार नियमावलीप्रमाणे यांची खोडे नितळ आणि उंच असली पाहिजेत.म्हणजे खालच्या भागावर फांद्या नकोत,हे शहाणपणाचे आहे.कारण खाली फारसा सूर्यप्रकाश पोचत नाही.म्हणून उगीचच खालच्या भागातले अवयव वाढवून त्यांना पोसत बसण्याची जरूर नाही.हे साधारण आपल्या शरीरासारखेच असते.जे स्नायू वापरले जात नाही त्यांना आपले शरीर फार पोषण देत नाही.पण फांद्या झाडांना स्वतःहून काही तोडता येत नाहीत.त्या गळून पडण्याची त्यांना वाट पाहावी लागते.त्यांना बरशीच्या हवाली सोडन दिले की लाकूड कुजून त्या मरून जातात आणि विघटन होऊ पुन्हा त्यांचा सेंद्रिय माल मातीत मिसळतो.अशा प्रकारे फांदी जिथे तुटते तिथे झाडाला जखम होते.बरशी खोडापर्यंत वाढू शकते कारण आता तिथे साल नसते.पण ही परिस्थिती झाडाला बदलता येते. पडलेली फांदी जर एखादा इंच जाड असली तर काही वर्षांतच तिथे साल धरते.आता तिथे आर्द्रता वाढवून झाड बुरशीला मारून टाकते.पण जर तुटलेली फांदी फारच जाड असेल तर या प्रक्रियेला दीर्घकाळ लागतो. जखम काही शतके उघडी राहते आणि तिथून बुरशी आत शिरून लाकडापर्यंत पोचते.खोड कुजून अशक्त होतं.आणि याच कारणासाठी झाडांच्या शिष्टाचाराच्या नियमावलीत खालच्या भागात फक्त छोट्या फांद्या असाव्यात असं फर्मान असतं.झाड वाढताना ही खालची फांदी जर तुटून गेली तर तिथे पुन्हा नवीन फांदी येऊ द्यायची नसते. पण काही झाडं नेमके हेच करतात.

शेजारचा एखादा वृक्ष मेला आणि सूर्यप्रकाश पोचू लागला की,काही झाडं खोडाच्या खालच्या भागातही कोंब वाढवू लागतात.या फांद्या जाड झाल्या की सुरुवातीला फायदेशीर ठरतात,कारण झाडाला आता वरच्या आणि खालच्या दोन्ही भागातून प्रकाश संश्लेषण करता येणं शक्य असतं.पण एके दिवशी,सुमारे वीस एक वर्षानंतर इतर झाडं आपला डेरा इतका वाढवितात की सूर्यप्रकाश पडणारी फट बंद होऊन जाते.आता पुन्हा खालच्या भागात अंधार पडतो आणि खालच्या जाड फांद्या मरून जातात.अशा प्रकारे आपल्या हव्यासाचा परिणाम झाडाला भोगावा लागतो.पुढच्या वेळेस तुम्ही जंगलात गेला आणि एखाद्या झाडाने अशा प्रकारची वाढ केली असेल तर त्यातून त्याचे चारित्र्य दिसून येईल.झाडाचा हा स्वतःचा निर्णय असतो,याचा अनुभव तुम्हाला येईल.जंगलाच्या उघड्या भागात वाढणाऱ्या झाडांकडे जरूर पहा.त्या सर्वांना असे बेपर्वा कृत्य करण्याचा मोह होतो,पण काही थोडेच जण तसे करतात.आणि इतर झाडं मात्र आपलं खोड नितळ ठेवून सुरक्षित राहतात.

समाप्त…!!

6/20/26

दुसरा वुइल्यम / Wuilliam II

लिखित इतिहासात १९१४ सालचे महायुद्ध म्हणजे, अत्यंत भयानक आपत्ती होय.हिची जबाबदारी कोणाही एका व्यक्तीवर वा राष्ट्रावर नसून सर्व मानवजातीवरच आहे.एकोणिसाव्या शतकात सारे जगच युद्धाचे विचार शिकत होते.शांततेचे विचार जणू जगातून लुप्तच झाले होते! 'आपापल्या जाती-जमातीपुरते वागताना सभ्य गृहस्थ राहा;पण राष्ट्राचे एक घटक या दृष्टीने गुंड बना' असा संदेश प्रत्येक राष्ट्र आपापल्या लोकांना देत होते. कल्पना करा की,हत्यारबंद लोक बोस्टन,बर्लिन वा बगदाद शहरात घुसले असून कोण अधिक लुटतो,

शेवटचा कैसर सम्राट दुसरा वुइल्यम,मानवजातीची कथा,हेन्री थॉमस, अनुवाद - सानेगुरुजी,मधुश्री पब्लिकेशन.

लुबाडतो व सर्वांना दहशत वा दरारा बसवतो,याबाबत त्यांची आपसात स्पर्धा लागली आहे व तिथे पोलीस वगैरे कोणी नाहीत,कायदेशीर साधन नाही. या हत्यारबंद गुंडांविरुद्ध उपाययोजना करील असे संघटित सामाजिक यंत्रही नाही.हुबेहूब अशीच स्थिती एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्थात व विसाव्या शतकाच्या सुरुवातीस जगातील बलाढ्य राष्ट्रांची होती.

युरोपातील प्रबलतर राष्ट्र जागतिक प्रमाणावर उठाठेवी व दंगामस्ती करणारी होती.युरोपात एक विशिष्ट मनोवृत्ती सर्वत्र बळावत होती. ही विशिष्ट राष्ट्रीय मनोवृत्ती जंगलच्या कायद्यावर उभारलेली होती.'बळी तो कान पिळी' हे या सर्वांचे ब्रीदवाक्य होते. 'आमच्या देशातले जे आम्हाला हवे असते ते आम्ही विकत घेतो, पण इतर देशांतले जे आम्हाला हवे असते,ते आम्ही चोरून घेतो.' असे सारी बलाढ्य राष्ट्र म्हणत.ती चढाऊ राष्ट्र घाणेरड्या व निंद्य खेळात मग्न झाली.पूर्वे कडील दुबळी राष्ट्र लुटायची हा जणू सर्वांचा धर्मच झाला! ती याला 'डाकूगिरी' म्हणत नसत,तर 'संरक्षण' म्हणत असत,फ्रान्सने अल्जीअर्स,मादागास्कर आनाम व टोंकिन यांचे संरक्षण करण्याचे ठरवले व त्यांना आपल्या पंखाखाली घेतले.ऑस्ट्रिया तुर्काच्या विरुद्ध रक्षण द्यायला उभा राहिला.बोस्निया व हर्झगोविना या प्रदेशांना त्याने जवळ घेतले.रशिया पोर्ट आर्थरचे रक्षण करायला गेला व जपानशी १९०४-०५ साली त्याचे युद्ध झाले.जर्मनी आफ्रिका व आशिया या खंडांत संरक्षणासाठी धावू लागला.त्याचे हे संरक्षित टापू होते. इंग्लंड सर्वांत जास्त चढाईखोर होते.हिंदुस्थान,इजिप्त, आयर्लंड इत्यादी दहाबारा देशांवर इंग्लंडने आपले पंख पसरले होते.रस्त्यातल्या एखाद्या लहान मुलाजवळची उसाची कांडी घेण्याचा जसा कोणालाही बिलकूल हक्क नसतो,तसाच या प्रबळ राष्ट्रांना दुबळ्या राष्ट्रांची मालमत्ता लुबाडण्याचा यत्किंचितसुद्धा हक्क नव्हता. पण राष्ट्रीय नीती व्यक्तीच्या नीतीच्या पाठीमागे शेकडो वर्षे असते.आपापल्या शासनसंस्थांच्या वतीने कारभार हाकणारे मुत्सद्दी आंतरराष्ट्रीय कारभारात असे वागतात की,तसे खाजगी नागरिक या नात्याने वागण्याचे ते स्वप्नातही मनात आणण्याचे धाडस करणार नाहीत. जर्मनी, फ्रान्स, इंग्लंड, रशिया, ऑस्ट्रिया व इटली इत्यादी राष्ट्रांनी जगाला चक्क जाहीर केले की, 'दुबळ्या राष्ट्रांवर सत्ता गाजवणे हे आमचे ईश्वरदत्त कर्तव्य आहे. हे भाग्य आम्हाला ईश्वराने दिले आहे!' व ती सर्व दुबळ्या राष्ट्रांना लुटावयास व गुलाम करायला पुढे सरसावली.वसाहतींचे साम्राज्य मिळवण्यासाठी वेडी स्पर्धा जोरात सुरू झाली. या स्पर्धेतून लवकर अथवा उशिरा जागतिक युद्ध पेटणार,यात शंका नव्हती, कारण या चढाऊ राष्ट्रांच्या परस्पर हितसंबंधांचे पुष्कळ वेळा खटके उडत,संघर्ष होत.ज्यांनी उत्कृष्ट प्रदेश आधीच बळकावले होते, त्यांच्याकडे इतर देश द्वेषाने व मत्सराने बघत.कारण त्यांना लुटीतला फारसा फायदेशीर वाटा मिळालेला नसे.पुष्कळदा एकाच तुकड्यावर अनेकांचे गिधाडी डोळे लागलेले असत.या स्पर्धेतून शस्त्रास्त्रांची स्पर्धा सुरू झाली.तोफांचा आवाज ईश्वर आवाजाप्रमाणे पूजिला जाऊ लागला.

सारे जग युद्धोत्सुक झाले. 'युद्ध', 'युद्ध' असा आवाज सर्वत्र घुमू लागला.प्रत्येक देशातील हरएक तरुणास शिकवण्यात येई की,दुसऱ्या देशातील दहांना तो भारी आहे.ही लढाऊ मनोरचना ऑस्ट्रिया जर्मनीतल्याइतकीच इंग्लंडमध्येही ठसविण्यात आलेली होती.जुन्या जगातील इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी, ऑस्ट्रिया, इटली, रशिया ही प्रबळ राष्ट्र १९१४ मधील महायुद्धासाठी अगदी कंबर कसून तयार होती.खुंट्या नीट पिरगळलेल्या होत्या डेव्हिड स्टार जॉन्सन याच्या शब्दात सांगायचे म्हणजे 'युरोपचे पिस्तूल भरलेले होते आणि एकदम स्फोट झाला.'म्हणून मागील महायुद्धाला साम्राज्यशाही स्पर्धा हेच मुख्य कारण होते.हे क्लेमेंकोच्या कारकिर्दीवरून लक्षात येईल.

क्लेमेंकोला 'वाघ' असे नाव होते व त्याबद्दल त्याला अभिमान वाटे. किप्लिंग हा या साम्राज्यशाहीचा महाकवी होता.काळ्या लोकांचे ओझे गोऱ्या लोकांना कर्तव्य म्हणून वाहावे लागते व गोरे लोक जगाचे प्रभू होण्यासाठीच जन्मलेले आहेत असे तो म्हणे.नित्शेचे मन सौंदर्य व वेडेपणा यांच्या दरम्यान लंबकाप्रमाणे हेलकावे खात असे.नित्शे स्वतः कोमल मनाचा व प्रेमळ स्वभावाचा होता. पण त्याने जगाला द्वेषाचे व युद्धाचे उपनिषद दिले.झार निकोलस याच्या धोरणात हीच साम्राज्यशाहीची उद्दामता होती.त्याची कारकीर्द ज्यूंच्या छळासाठी व फटाक्यांच्या थैमानासाठी प्रसिद्ध आहे.पण सम्राट दुसरा वुइल्यम यांच्या अहंमन्य शब्दांनी व रानवट कृतींनी या सर्वांना रंगरूप आले.

वुइल्यम होएनझोलर्न याने एकट्यानेच मानवजातीला युद्धात ढकलले असे नव्हे.तो अनेक साम्राज्यवाद्यांपैकी एक होता.पण त्याचा आवाज सर्वांहून बुलंद होता. त्याची घनगर्जना होती.जे अपराधी होते,युद्ध पेटवण्याचा गुन्हा करणारे होते,त्यात हा वुइल्यम पटकन उमटून पडे. दुसरे गुन्हेगार आपले पाप गुप्तपणे,मुत्सद्देगिरीच्या पडद्याआड,गाजावाजा न करता,मोठ्या शिताफीने करीत.त्यामुळे पुष्फळ अविवेकी इतिहासकार त्यामागील महायुद्धातल्या माणुसकीस काळीमा लावणाऱ्या गोष्टींचे खापर एकट्या वुइल्यम कैसरच्याच डोक्यावर फोडतात.

पण आपण लक्षात ठेवले पाहिजे की,कैसर हा एकटाच काही गुन्हेगार नव्हता.विसाव्या शतकातला पोषाख केलेल्या,पण केवळ रानटी व अत्यंत प्राचीन काळच्या जंगली पूर्वजांप्रमाणे असलेल्या,साम्राज्यवादी लोकांचा तो एक प्रतिनिधी होता.जवळजवळ प्रत्येक देशात असे लोक होते आणि तेच राज्यकारभार चालवीत असत,ही बस्तुस्थिती ध्यानी धरून कैसर वुइत्वमचे जीवन आपण पाहू या.

कैसर एकोणीस वर्षांचा असताना म्हणजे १८५९ साली त्याची आजी,इंग्लंडची राणी व्हिक्टोरिया,ही हिंदुस्थानची सम्राज्ञी म्हणून घोषणा करण्यात आली. त्याच वेळी त्याने मनाशी खूणगाठ बांधून ठेवली की,मी जेव्हा जर्मनीचा राजा होईन तेव्हा मीही असाच सम्राट होईन व वाटेल ती किंमत देऊन जर्मन साम्राज्य वाढवीन.त्याचे वडील तिसरे फ्रेडरिक हे १८८८ सालच्या जून महिन्यात वारले.त्यांनी फक्त तीनच महिने राज्य केले.वुइल्यमला राज्याभिषेक झाला. त्याने गादीवर येताच चॅन्सेलर बिस्मार्क याला काढून टाकले व आपण एकट्याने राज्य चालवायचे ठरवले.वुइल्यम फार उंच नव्हता.त्याचा डाव हात सुकलेला होता.त्याची बुद्धीही काही मोठी अपूर्व नव्हती,पण तो स्वतःला आपल्या अहंकाराच्या आरशात पाही. 'आपण महाप्रभू आहोत', 'ईश्वराच्या खालोखाल जर कोणाचे वैभव असेल, तर ते आपलेच', असे त्याला वाटे. त्याने आपल्यासमोर जणू जिहोव्हाचा आदर्श ठेवला होता. तो तद्‌नुसार वागत होता.त्याच्याप्रमाणे आपणाला बनवू पाहत होता.आपले यशोवैभव वाढवण्यासाठीच मानवजात आहे,असे त्याला वाटे.कीर्तीची अपरंपार भूक त्याला होती.आपल्या पिढीतील जास्तीतजास्त मोठा आवाज करणारा आपणच व्हावे असे त्याला वाटे. सारी राष्ट्रे आपणाकडे पाहत राहतील अशा रीतीने आपल्या तलवारीचा खणखणाट करण्याचे त्याने ठरवले होते.ब्रिटानिया समुद्राची स्वामिनी होती.कैसरनेही भूमीचा तसाच समुद्राचाही स्वामी होण्याचे ठरवले. त्याचे निर्दय व कठोर डोळे जगाला कः पदार्थ मानीत. त्याच्या मिशांची दोन्ही टोके वर पिळलेली असतजणू तो स्वर्गालाही तुच्छ मानीत होता,स्वर्गालाही ऐट दाखवत होता !

सारी राष्ट्र तलवारीच्या साधनाने आपापली राज्ये-साम्राज्ये वाढवण्यासाठी धडपडत होती,स्पर्धा करीत होती."ठीक." कैसर म्हणाला, "या सर्वांना जर्मन राष्ट्र तलवार कसे धरते ते दाखवून देतो." सारे इंग्लंड युद्धभावनांनी नाचत होते. पुढील गीत सर्वांच्या ओठावर होते - "आम्हाला लढण्याची इच्छा नाही,पण लढण्याची वेळच आली तर आमच्याजवळ भरपूर आरमार आहे,भरपूर द्रव्यबळ आहे व भरपूर मनुष्यबळही आहे."

इंग्लंडचे आव्हान वुइल्यमने स्वीकारले,"मीही माझ्या जर्मनीला माझ्या हयातीत सैन्य,संपत्ती, व गलबते मांनी संपन्न करतो..”अशी घोपना करून तो प्रतिज्ञेवर सांगे.

की, "माझे सारे जर्मन राष्ट्रच शिपाईगिरीचा पेशा पत्करील.विजयी चढाई हेच माझे जीवितकार्य!" राज्यावर येताच तो म्हणाला,"सैन्यावरच माझी सारी भिस्त आहे.'आपल्या जर्मन राष्ट्राला शिस्त शिकवायला, शिक्षण द्यायला व संघटित करायला तो उभा राहिला. कत्तलीसाठी तो त्यांना पुष्ट करू लागला.इतिहासातील अत्यंत अव्यंग असे युद्धतंत्र त्याने निर्माण केले व ते खरोखरच इतके परिपूर्ण होते की,ते शेवटी वाटोळे फिरले व निर्मात्याचाच निःपात करते झाले.

वुइल्यम जगभर प्रवासार्थ निघाला.लंडन, रोम, व्हिएन्ना, अथेन्स, कॉन्स्टॉटनोपल इत्यादी शहरांतून तो मिरवीत गेला.आपण किती अद्भुत पुरुष आहोत हेच जणू जगाला दाखवू पाहत होता.तो पॅलेस्टाईनला गेला व घोड्यावर बसून जेरुसलेम शहरात शिरला.देवाप्रमाणेच त्याला मिरवत नेण्यात आले.त्याच्या खास प्रवेशासाठी तेथील भिंतीला मुद्दम नवीन दरवाजा करण्यात आला होता.नेहमीच्या सामान्य दरवाजातून जाणे कैसरला कमीपणाचे होते..जगातील सर्वांत मोठे आरमार आपल्यापाशी असावे म्हणून १८९५ साली त्याने इंग्लंडशी स्पर्धा सुरू केली. तो म्हणाला, "माझे लष्कर ज्या दर्जाचे आहे,त्याच पराकोटीला माझे आरमार नेल्यावाचून मी स्वस्थ बसणार नाही."

आणि इतर राष्ट्रही स्वस्थ बसली नव्हतीच, डेन्मार्क व हॉलंड यांसारखी काही राष्ट्र सोडून दिली तर इतर प्रत्येक देशाच्या अंदाजपत्रकात उत्पन्नाचा नव्वद टक्के भाग युद्धावरच खर्च होई,संरक्षक व आक्रमक दृष्टींनी दोस्ती करण्यात येई.इंग्लंड, फ्रान्स व रशिया यांनी आपला एक दोस्त संघ बनवला,तर जर्मनी व ऑस्ट्रिया यांनीही आपली गट्टी केली.ज्याच्यावर सूर्य कधीही मावळत नाही,असे आपले अवाढव्य साम्राज्य वाढवण्याचा निर्धार इंग्लंडने केला होता. आशिया व आफ्रिका खंडांतले आपले साम्राज्य टिकवायचे व १८७० साली जर्मनीने बळकावलेले अल्सेस व लॉरेन्स हे प्रांत परत घ्यायचे,असे फ्रान्सच्या मनात होते. रशिया भयभीत झाला होता.वसाहतींच्या चढाईत जर्मनीची स्पर्धा पाहून त्याच्याही तोंडाला पाणी सुटले.त्याचाही स्वार्थ जागृत झाला.युद्ध लवकर सुरू व्हावे म्हणून शक्य ते सर्व ऑस्ट्रिया व जर्मनी यांनी केले.कैसरला गर्व चढला होता.तो दटावीत होता,दरडावीत होता,आपल्या मोठेपणाची गर्जना करीत होता आणि महायुद्धाचा दिवस कधी येतो,याची वाट पाहत होता.

१९१४ साली दोन्ही पक्ष तयार झाले होते.युद्ध सुरू करण्यासाठी सारेच जण एखाद्या निमित्ताची वाट पाहत होते.फर्डिनंड हा ऑस्ट्रियाच्या गादीचा वारस होता.तो बोस्नियाची राजधानी सारायेव्हो येथे गेला होता.हा प्रांत आरंभी सव्हियाचा होता.तो तुर्कांनी घेतला होता व तुर्काच्या हातून सरतेशेवटी ऑस्ट्रियाने बळकावला होता.१९१४ सालच्या जूनच्या अठ्ठाविसाव्या तारखेस एका देशप्रेमी सर्व्हियन विद्यार्थ्याने सारायेव्हो येथे फर्डिनंडचा खून केला.सर्व्हियाचा प्रदेश ऑस्ट्रियाने गिळंकृत केलेला पाहून तो विद्यार्थी चिडला होता.

ऑस्ट्रियाने जुलैच्या अठ्ठावीसाव्या तारखेस सर्व्हियाशी युद्ध पुकारले.रशिया अशा एखाद्या संधीची वाटच पाहत होता.सर्व्हियाला मदत करण्याच्या मिषाने ऑस्ट्रिया व जर्मनी यांच्याविरुद्ध आपल्या सैन्याच्या हालचाली त्याने केल्या.जर्मनीने रशियाविरुद्ध व रशियाचा गुप्त मित्र फ्रान्स याच्याहीविरुद्ध सुरू युद्ध पुकारले.युद्धाच्या पहिल्या घोषणेनंतर आठच दिवसांत हा वणवा सर्वत्र भडकला.युरोपातील सर्व प्रमुख राष्ट्र कत्तली करण्याचा गुन्हा करू लागली.रक्ताचा सडा घालण्यात आला.एक कोटी मानवांचा संहार झाला.

१९१७ साली अमेरिकाही युद्धात ओढली गेली.भीती, स्वार्थ व अभिमान यांच्या संमिश्र भावना अमेरिकेस युद्धात खेचत्या झाल्या. 'जर्मनांचा जय झाला तर?' अशी भीती खरोखरच काही अमेरिकनांना वाटे विजयी कैसरचीही त्यांना धास्ती वाटे.दोस्तांना दारूगोळा पाठवणाऱ्या काही कारखानदारांना जर्मनीच्या पाणबुड्यांचा त्रास होत होता. १९१५ सालच्या मे महिन्यात जर्मन पाणबुड्यांनी योग्य सूचना देऊन लुसिटानिया ही अमेरिकन बोट बुडवली.ही दोस्तांसाठी तोफा नेत होती.काही उतारूही तिजवर होते.प्रेसिडेंट वुइल्सने कैसरला एक कडक पत्र लिहिले.पण आपल्या देशबांधवांना तो म्हणाला, "मी क्षुद्रासारखे एकदम युद्ध सुरू करणार नाही." १९१६ साली वुइल्सनच पुन्हा प्रेसिडेंट निवडला गेला.त्याच्या निवडणुकीचे घोषवाक्य 'मी अमेरिकेला युद्धापासून अलिप्त ठेवले' हे होते. प्रत्येकाच्या ओठावर 'मी माझा मुलगा लढाईत मारण्यासाठी नाही वाढवला!' हे गाणे होते. अमेरिकेतील बहुजन समाजाचे मत या गीतात होते. पण प्रेसिडेंट म्हणून निवडून आल्यानंतर दोनच महिन्यांत वुइल्सनला जर्मनीविरुद्ध युद्ध पुकारावे लागले. 'अमेरिकेच्या गलबतास धक्का लावू नका' असे त्याने कैसरला बजावले, तेव्हा कैसरने जबाब दिला की, 'आमच्याविरुद्ध असणाऱ्या दोस्त राष्ट्रांना दारूगोळा पुरवणे बंद करा.' वुइल्सनसमोर दोनच मार्ग होते. एक तर दारुगोळा पाठवणे बंद करणे किंवा जर्मनीबरोबर युद्ध पुकारणे. त्याने पहिला मार्ग पत्करला असता तर शस्त्रास्त्रे व दारूगोळा तयार करणाऱ्या कारखानदारांचे नुकसान झाले असते.पण अमेरिकेत शांतता राहिली असती.वुइल्सनने दुसरा मार्ग पसंत केला.तो शाळा मास्तराच्या वृत्तीचा होता.दुसऱ्यांसाठी तो कायदा करी.पण स्वतःकधी कोणाचा सल्ला घेत नसे. कैसरने वुइल्सनचे मानण्याचे नाकारले.तेव्हा त्याला धडा शिकवण्यासाठी त्याने अमेरिकन मुलांना युरोपात पाठवण्याचे ठरवले.तेव्हा त्याला धडा शिकवण्यासाठी त्याने अमेरिकन मुलांना युरोपात पाठवण्याचे ठरवले. प्रथम युद्ध न करण्याची स्वाभिमानता वुइल्सनजवळ होती;पण आता युद्धापासून दूर राहणे त्याच्या गर्वास व अभिमानास पटेना.

कैसर गमावली जाणारी लढाई लढत होता.म्हणून तर त्याने निकरावर येऊन निर्दयपणे आणि हट्टाने पाणबुड्यांची लढाई सुरू केली होती.त्याने शेवटचा पत्ता टाकला होता.अमेरिका युद्धात ओढली गेली.कैसरचे लष्करी तंत्र कोलमडण्याला आता केवळ काही महिनेच अवकाश होता. ते १९१८ सालच्या उन्हाळ्यात गडगडले.जर्मन सैन्याचा धुव्वा उडाला! ते पळत सुटले ! कैसर गलबतात बसून पळून गेला.भेदरलेल्या सशाप्रमाणे तो हॉलंडात गेला.त्याने लाखो लोकांना युद्धाच्या खाईत लोटले.पण ते मरणसंगीत स्वतः ऐकण्याचे धैर्य मात्र त्याला नव्हते.हॉलंडमध्ये डॉर्न येथे तो हद्दपारीत राहिला.त्याच्या जीवनातील आवाज आता बंद पडला,मंद झाला.आता गडबड नव्हती,गर्जना नव्हती,सारे शांत होते. लष्करी आक्रमणकाळात तो जितका सुखी होता.त्यापेक्षा अधिक सुखी तो हॉलंडमध्ये असेल अशी आशा करू या.

त्याच्या आडदांड कारकिर्दीने जगाला दोन गोष्टी पटवल्या... १.राजेशाही ही आता एक जुनाट गोष्ट झाली होती. २. यापुढे आंतरराष्ट्रीय.अनियंत्रित स्पर्धेच्या जागी आंतरराष्ट्रीय सहकार्य आले पाहिजे,तरच मानवजात वाचण्याचा संभव आहे. १९१४ सालच्या युद्धासारखी जगव्याळ आपत्ती पुन्हा जगावर येता कामा नये.

।।। समाप्त ।।।




6/18/26

दख्खनचा अकबर / Akbar of the Deccan

जलालुउद्दीन अकबराच्या सत्तेचं चोविसावं वर्ष चालू असताना विजापूरच्या अदिलशाहच्या तख्तावर दहा वर्षांच्या एका मुलाला बसवण्यात आलं.'इब्राहिम द्वितीय' हा तो मुलगा मुघल बादशाहपेक्षा वयाने कित्येक वर्षं लहान होता.पण या दोघांची भेट झाली असती,तर त्यांना एकमेकांच्या संगतीत फार आनंद लाभला असता. त्यांच्यात भौगोलिक अंतर होतंच;पण त्याचबरोबर पिढ्यांचंही अंतर होतं.तसं असूनही मोगल बादशाह आणि दख्खनचा हा सुलतान यांच्यात खूप साम्यही होतं.दोघंही कलेचे आश्रयदाते होते,कर्तबगार होते आणि करिष्माई होते.तसंच 


आपल्या आजच्या काळाशी जुळणारी अशी त्या दोघांची कुठली गोष्ट असेल तर त्या दोघांनी ज्या समाजावर राज्य केलं, त्या समाजांच्या वैविध्यपूर्ण सहजप्रेरणांना त्यांनी कवेत घेतलं. असं करून त्यांनी एका भव्य, देखण्या युगाला जन्म दिला. त्यांनी अशा एका मार्गावरचे दिवे उजळवले जे अजूनही, म्हणजे या दोघांनाही थडग्यात जाऊन शतकं लोटली, तरीही प्रकाशमान आहेत.


अकबराच्या धार्मिक दृष्टिकोनांचं लोकांनी आकलन करून घेतलं आणि त्याविषयी लेखनही केलं. त्यामागे त्याचा धाक होता.परंतु या बादशाहच्या सावलीमध्ये 'इब्राहिम द्वितीय' हा तुलनेने लहान राजा मात्र इतिहासाच्या विस्मृतीतच गेला.


गणिका,महात्मा,आणि एक इटालियन ब्राह्मण,भारतीय इतिहासातील अज्ञात कहाण्या,एस.पिल्लई,अनुवाद-

सविता दामले 


विजापूरचा 'इब्राहिम आदिलशाह द्वितीय' हा फारच आश्चर्यकारक माणूस होता,ते केवळ तो नखं लाल रंगाने रंगवायचा म्हणून नव्हे,लहानपणीच त्याची भेट एकदा काही शिवभक्तांशी झाली,तेव्हा त्यांच्याशी आलेल्या संवादाचा त्याच्यावर एवढा प्रभाव पडला की,त्यामुळे त्याच्या मनात हिंद परंपरांविषयी आयुष्यभर पुरेल आकर्षण निर्माण झालं.म्हणजे औपचारिकरीत्या तो सुन्नी मुस्लीम असला तरी तो मेला तेव्हा त्याचा खरा धर्म कुठला याविषयी एवढा संशय निर्माण झाला होता की,सर्व संबंधितांना आश्वस्त करण्यासाठी त्याच्या कबरीवरील शिलालेखावर कोरण्यात आलं,"नाही, सत्य हेच आहे की इब्राहिम हा ज्यू नव्हता की ख्रिश्चनही नव्हता.तो मुस्लीमच होता,त्याची श्रद्धा विशुद्ध होती.तो मूर्तिपूजक तर नक्कीच नव्हता." आता ही शेवटची ओळ तर पूर्ण खोटीच होती. कारण आदिलशाहचं विश्वच मुळी हिंदू प्रभावाने ओतप्रोत भरलेलं होतं.त्याच्या कारकिर्दीत त्यानं बऱ्याच मंदिरांना देणग्या दिल्या,यात्रेकरूंना सुप्रसिद्ध तीर्थस्थानांवर जायचे अधिकार बहाल केले आणि हिंदू देवतांना राजभक्तीच्या उंचीवर जाणीवपूर्वक नेलं.


पण हे जे काही लिहिलं आहे ते लिहिताना या सभ्य (!) शहजाद्याच्या (अकबरासारख्याच) लष्करी अवताराकडे दुर्लक्ष करण्यासाठी नव्हे.या लष्करी पराक्रमात भावांना आणि वर्चस्व गाजवणाऱ्या पालनकर्त्यांना (बालवयाच्या राजाला सांभाळणाऱ्या लोकांना) ठार मारणं बसत होतं. पण तो सौम्य आणि तुलनेने अधिक विधायक मनःस्थितीत असे,तेव्हा तर हा इब्राहिम दुनियेला आपल्या मोहात पाडू शकत होता.त्याच्या बऱ्याच फर्मानांची सुरुवात हिंदू देवता सरस्वतीस आवाहन करून होत होती.त्याची ही या देवीवरची भक्ती एवढी उघड होती की,त्याच्या दरबारातल्या एका गटाची तर खात्रीच झाली होती की,हा सुलतान एक तर गुप्तपणे हिंदू धर्माचं पालन करत असला पाहिजे किंवा मग तो स्वधर्मत्यागाच्या उंबऱ्याशी पोहोचला असला पाहिजे.एका टप्प्यावर तर त्यानं विजापूरचं (मूळ विजयपूरचं) नाव 'विद्यापूर' ठेवलं होतं.त्यानं लिहिलेल्या एका कवितेत अशा काही संकल्पना व्यक्त केल्या होत्या की,कर्मठ मुस्लीमांना त्या मूळ इस्लामी विचारांपासून खूप दूर जाणाऱ्या आणि त्यांच्या कट्टर छापाच्या इस्लामविरोधी वाटल्या होत्या.उदाहरणार्थ,त्यानं कवितेत लिहिलं होतं की:


भाषा वेगवेगळ्या असतात;

पण भावनिक आवाहन एकच असतं.

मग तो ब्राह्मण असो की तुर्की,

ज्याच्याकडे पाहून विद्येची देवता (सरस्वती) हसते

तोच भाग्यवान ठरतो.


खरोखरच,या इब्राहिमने त्याचं सुप्रसिद्ध 'किताब इ नवरस' हे पुस्तक प्रसिद्ध केलं तेव्हा त्यानं जगाला चित्रपूर्ण शैलीचा.रूपकांनी भरलेला असा एक लक्षवेधी ग्रंथ तर दिलाच पण त्याच्या काळात जे वेगवेगळ्या धर्माचं मीलन होत होतं,त्याचं ओझरतं दर्शनही त्यानं त्यातून घडवलं.


हे पुस्तक राजकारणाच्या जगाचा संदर्भ तर देतंच; पण ते त्याच्या राजेशाही घराचंही दर्शन घडवतं. त्यात योद्धा राणी चांदबिबीसारख्या व्यक्तिरेखांचा उल्लेख आहे तसंच त्याचा पाळीव हत्ती अताश खान याचाही उल्लेख आहे.शिवपार्वतीसारख्या हिंद देवदेवता त्यात आहेत आणि महान संस्कृत महाकाव्यांचाही परिणाम त्याच्यावर झालेला दिसतो.लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे,त्यानं बरीच चित्रं काढवून घेतली त्यांत एक सरस्वतीचं चित्रही होतं.त्यात ती सोन्याच्या सिंहासनावर सोबत मोर,शंख,वीणा,कमळ इत्यादी सर्व पारंपरिक वाद्ये आणि प्रतीके यांच्यासह बसलेली दिसते.परंतु आजच्या तिच्या परिचित रूपापेक्षा किंवा पुरातनकालीन शिल्पांतील रूपापेक्षा इब्राहिमची सरस्वती शुभ्रवसना असूनही ती पटकन ओळखता येणाऱ्या हिंदू शैलीत न दिसता राजघराण्यातल्या मुस्लीम राजकुमारीसारखीच अधिक दिसते. त्याचप्रमाणे त्या चित्रात लिहिलेले पुढील शब्दही या इब्राहिम आदिलशाहला त्या देवीबद्दल केवढं प्रेम होतं ते व्यक्त करतात.तिथे लिहिलं आहे - इब्राहिम म्हणजे तोच ज्याचा पिता 'गुरू गणपती' असून माता 'पवित्र सरस्वती' आहे.त्यामुळेच तर दरबारातले काही लोक त्याच्यावर क्रुद्ध झाले होते यात काहीच नवल नाही.या इब्राहिम आदिलशाहचं चित्र बरेचदा गळ्यात रुद्राक्षांच्या माळा घातलेलं काढलं जात होतं,त्याच्या नाण्यांवरही संस्कृतमध्ये 'दुर्बलांचा रक्षक' असा दावा केलेला होता.अशा प्रकारे त्यानं सर्व समृद्ध हिंदू परंपरांचा स्वीकार केला होता;पण त्याच्या या धोरणावर व्यवहारातले काही परिणामही होत होते.१५६५ साली विजयनगर साम्राज्याचं पतन झाल्यावर मोठ्या संख्येने हिंदू कलाकारांची दैना उडाली,तेव्हा इब्राहिमने आपलं हृदय आणि खजिना त्यांच्यासाठी खुला केला आणि त्यांना विजापुरात आश्रय दिला.त्याच्या नोकरशाहीत मराठी ब्राह्मण तर आधीच मोठमोठ्या पदांवर होते,आता इब्राहिमनं तेलुगू आणि कन्नड व्यावसायिकांना कला,संगीत,वास्तुकला या क्षेत्रांची दारं उघडून दिली.


स्वतः आदिलशाह दरबारात मराठी बोलणं अधिक पसंत करत होता हे बघून एक मुघल राजदूत तर आश्चर्याने थक्कच झाला होता.तसंच त्याच्या जनानखान्यातली आवडती राणीही रंभा नावाची मराठी नर्तिका होती.त्याच्या इराणी पूर्वजांची आणि उत्तरेकडील बादशाहची भाषा फारसी हिच्यापेक्षा इब्राहिमची अधिक पकड संस्कृतवरच होती हेही सर्वज्ञात आहे.


अधिक कट्टर लोकांना आदिलशाहचं हे 'स्थानिक' गोष्टींत रंगून जाणं म्हणजे मुस्लीम धर्माचा विश्वासघात केल्यासारखंच वाटत होतं.कारण केवळ काही पिढ्याच अगोदरचे त्याचे पूर्वज यापेक्षा पूर्णतया वेगळं वर्तन करत होते.ते फारसीला महत्त्व देत होते आणि स्थानिक प्रभावास तावातावाने नाकारत होते.अगदी सैनिकांनाही ते इराणी पद्धतीचे गणवेश घालायला आणि कवायती करायला लावत होते.


त्यामुळे कर्मठ मुस्लीमांकडून येणारी प्रतिक्रिया विजापूरच्या वळणावर येऊनच थांबली होती,यात आश्चर्य तर कसलं? अकबर हा खरा मुस्लीम धर्म पाळत नाही,त्याला तो कमी समजतो असं म्हणणारा बदायुनी उत्तरेला होता,तसंच अदिलशाहला हा फटका कर्मठ मुल्लांकडून नव्हे, तर सूफींकडून बसला.त्याचं असं झालं की एक सूफी अवलिया विजापुरात आला आणि त्याला समजलं की, राजाला हिंदू गाण्याबजावण्याची भुरळ पडली आहे. तेव्हा त्यानं हट्ट धरला की इब्राहिमने अशा देवाला न साजेशा लोकांच्या संगतीतून जाणीवपूर्वक दूर झालं पाहिजे.


तेव्हा सगळ्याच कटकट्या म्हाताऱ्यांना शांत करण्यासाठी तरुण मंडळी जसं म्हणतात की,मी प्रयत्न करतो,तसंच इब्राहिमनंही केलं आणि सरतेशेवटी त्या म्हाताऱ्या सूफी संताला पेन्शन देऊन जहाजाने मक्केला कायमचं पाठवून दिलं. आणखी एका सूफी संतचरित्रात म्हटलंय की आदिलशाहला एका हिंदू योग्याच्या तावडीतून सोडवा असं बऱ्याच लोकांनी त्याला विनंती केली. त्या कहाणीत लिहिलंय,की या कामात तो सूफी संत केवळ आदिलशाहलाच योग्य मार्गात आणण्यात यशस्वी झाला नाही तर त्यानं त्या योग्यालाही धर्मांतर करून मुसलमान बनवलं. या दाव्याची सत्यता संशयास्पद असली,तरी त्यातून चित्र स्पष्ट होतं,ते म्हणजे या राजावर बिगर मुस्लीमांचा भरपूर मोठा प्रभाव होता.त्यामुळे विजापुरातील सामर्थ्यवान गटांना चिंता वाटू लागली होती आणि आग्र्यातील मुघल सम्राटाच्या राजधानीतील लोकांच्याही ते लक्षात येऊ लागलं होतं.आज अकबर आणि 'इब्राहिम द्वितीय' हे राजे आपल्या जगाकडे बघण्यासाठी परतले तर त्यांना त्यांच्यासारखी कुतूहल आणि चैतन्य असलेली बरीच माणसं दिसतील.पण त्यांच्यासारखंच याही काळात त्यांना अशी माणसं दिसतील,जी दुसऱ्यांनी काय विचार करावा,कुणाची आज्ञा पाळावी यात हस्तक्षेप करणारी असतील.

6/16/26

नोकोबी लढाया ! Nokobi battles !

रेव्हरंड वेन लेबो दक्षिण यूएसएतल्या कर्मठ धर्मवाद्यांमधलं बडं प्रस्थ.तो स्वतःला 'गिडियनची तलवार' म्हणवून घेत असे; म्हणजे 'कठोर धर्मसंरक्षक'! तो कोणत्याही औपचारिक धर्मपीठाचा रेव्हरंड नव्हता.त्याचं स्वतःचंच एक पीठ होतं.तो मॉन्रोव्हिलच्या तुरुंगात पहारेकरी होता, आणि त्याला खूष ठेवायला बरेच कैदी 'चर्च ऑफ द इटर्नल रिडीमर'चे सभासद होत असत.रॅफचा वार्ताहर मित्र बिल् रॉबिन्स लेबो आणि त्याचे साथीदार यांच्या बाबतीतला जाणकार होता.

"मी विचारतो आहे,मी कितपत काळजी घेऊ, काळजी करू? ते 'पाखंड्यांना येशू मारेल' प्रकरण मला धोकादायक नाही आहे ना?" रॅफनं विचारलं.

"मी ऐकतो आहे,की तुला जे भाषण दिलं लेबोनं,ते इतरांनाही दिलं आहे.प्राध्यापक,शाळांचे हेडमास्तर, काही राजकारणी वगैरे.तू एकटा नाही आहेस ! पण बहुधा ते सगळं त्याच्या साथीदारांसाठी असतं.तो त्यांना दाखवत असतो,'बघा, कसं घाबरवतो या नास्तिक उदारमतवाल्यांना!" बिल् म्हणाला.

"पण मारामाऱ्या करतात का त्याची माणसं ? पोलिसांना सांगून ठेवायला हवं का मी?"

"आहे काही मारठोकीचा इतिहास.काही जण नाहीसेही झाले आहेत.काही खूनही आहेत.पण आज तरी लेबो आणि त्याच्या गँगवर कोणते आरोप नाहीत.आणि सगळ्या घटना इतर चर्चेस, फुटून निघालेले लोक,वगैरेंच्या आहेत. तुझ्यासारख्या बाहेरच्यांचा संबंध नाही."

सत्तास्पर्धा दिसते आहे!" रॅफ म्हणाला.

"असू शकते.सांभाळून राहा. हवं तर पोलिसांना सांग .. आणि.त्यांना सांगितलं आहेस हे लेबोला सांग ! कुणास ठाऊक ? कोणीतरी लेबोला मारायचा प्रयत्न करत असेल!"

पण मध्ये वेगळंच काहीतरी घडलं.जेप्सन लोकांमध्ये नोकोबी जमीन विकण्यावर एकमत झालं!

लवकरच संडरलंड असोसिएट्सनं नोकोबी पट्टा विकतही घेतला,इतर स्पर्धक बिल्डरांना हटवून. आता संडरलंडच्या अधिकाऱ्यांची एक बैठक झाली,पुढे काय करायचं ते ठरवायला.

"काही अडचणी आहेत,पर्यावरणवाल्यांच्या.त्यांना कमी लेखू नका.ते म्हणताहेत की नोकोबीच्या पश्चिमेचा पट्टा जीव-श्रीमंत आहे." रॅफनं सांगितलं.

"म्हणजे नेमकं काय?" एका उपाध्यक्षानं विचारलं. त्याच्याकडे दुर्लक्ष करून रॅफनं आपला अहवाल सुरू ठेवला.

"त्या पट्ट्यातल्या दोन सॅलामँडर्सच्या जाती, एक पक्षी,एक कासव,सगळे धोक्यातले जीव कायद्यानं संरक्षित आहेत.आणि पिचर प्लँटच्या दोन जाती तर जगात इतर कुठेच सापडत नाहीत.त्या 'एंडेमिक' आहेत, प्रदेशनिष्ठ."

आता उपाध्यक्ष भडकला."सॅलामँडर्स आणि पिचर प्लँट्स ! गेलं सालं आपण आखलेलं गोल्फचं मैदान !"

"इतरही आहे." रॅफ शांतपणे म्हणाला."नोकोबीची लाँग लीफ पाईनची झाडं कापायला परवानगी नाही.आपल्याला वाटलं होतं,की ती झाडं सगळ्या भागात भेटतात,त्यामुळे नोकोबीत ती कापायला परवानगी असेल.पण इथली झाडं मूळची आहेत, 'ओल्ड ग्रोथ' म्हणतात तशी.आणि अशी मूळची झाडं देशभरात फक्त दोन टक्के उरली आहेत, म्हणून ती कापण्यावर बंदी आहे.दहा लाख डॉलरचं लाकूड आहे नोकोबीत,पण कापता नाही येत."

यावर उपाध्यक्षांची फौज,खुद्द ड्रेक संडरलंड वगैरेंनी बरीच चडफड केली.सगळ्यांना देवाची अकरावी आज्ञा पाठ होती,की फायदा कमवायला काहीही केलेलं चालतं.आणि विकासातून फायदा होणार होता.माणसं,त्यांचे रोजगार,दरडोई उत्पन्नात वाढ, या साऱ्यांच्या तुलनेत मूठभर जीवजातींचा अग्रक्रम

खालीच मानत होते,सगळे.उपाध्यक्षानं हा सगळा युक्तिवाद मांडला.तोही इतक्या सुसूत्रपणे,की संडरलंडची मानही डोलू लागली.आता उपाध्यक्षानं शेवटचं हत्यार उपसलं.

"ही देवाची इच्छा आहे." तो गंभीरपणे म्हणाला. "तुम्हाला बायबलमध्ये भेटेल ते.त्यानं आपल्याला पृथ्वीचं राज्य दिलं.बसून आ वासून पाहायला नाही, सुबत्ता वाढवायला,वंश वाढवायला."

रॅफला कधीतरी युक्तिवादात देव येणार हे माहीत होतंच."पटतं मला तुझं,रिक्.पण असाही विचार कर,की लोकांना जीवनाचा दर्जा,जीवनाची गुणवत्ता वाढून हवी असते.नोकोबी पश्चिममध्ये उच्च गुणवत्ता आहे,आज.पण आपण धसमुसळेपणा केला तर वृत्तपत्रं हल्ला करतील.तू बिल् रॉबिन्सचे लेख वाचतोस 'रजिस्टर' मधले ? तो दलदली,मूळ वृक्ष,यांच्यावर फार तिखट लिहितो. उद्या इतर संस्था त्याचं ऐकून त्रास द्यायला लागतील,न्यू सिएरा क्लब्,नेचर काँझर्व्हन्सी, लाँग-लीफ अलायन्स,वाट्टेल ते लोक येतील, आपल्याला माहीतही नसलेले."

रिकूनं हात हवेत उडवले,"इथल्या खूप लोकांना शिकार आवडते.मासे पकडायला आवडतं. कोणत्याही वादात त्यांना माणसांचा विचार आधी करायचा असतो.त्यांना राखीव जंगलं आणि जंगल-खात्याचे पहारेकरी आवडत नाहीत.त्यांच्या मते येशू माणसांचे आत्मे वाचवायला पृथ्वीवर आला,किड्यामकोड्यांसाठी नाही."

रॅफचे डोळे विस्फारले. ही सगळी वाक्यं थेट लेबोशी झालेल्या संभाषणातली होती.

ड्रेक संडरलंड अस्वस्थ होता.प्रेस आणि मीडियाचा विरोध त्रासदायक होता,पण मग काय सारी योजना सोडून द्यायची? छ्याः हा सायरसचा भाचा नको ती खुसपटं काढतो आहे !

"ठीक आहे,रॅफ.तुझा काय सल्ला आहे?"

"ड्रेक --" रिक् बोलायला लागताच संडरलंडनं त्याला हातानं थांबवलं.

रॅफनं त्याच्या ब्रीफकेसमधून एक फाईल काढली. "मिस्टर संडरलंड,रिक् -आपण जरा धोरण बदलून प्रश्न सोडवू शकतो.हे सगळे परिसर आणि मरू घातलेल्या जाती वगैरेंना खर्च न मानता नफ्यात धरू शकतो."

त्यानं तीनतीन पानी काही संच काढले,आणि सगळ्यांना एकेक संच दिला.

"पहिल्या पानावर मी महागड्या वृद्ध लोकांसाठीच्या योजनांमध्ये गेली चाळीसेक वर्षे कसेकसे बदल झाले,ते नोंदवलं आहे.त्यातही आपल्या दक्षिण भागातल्या योजना सुट्या दाखवल्या आहेत.फायदेशीरपणा दोन गोष्टींवर ठरताना दिसतो.एक म्हणजे मोठ्या गावांशी जवळीक,आणि दुसरं म्हणजे योजनेभोवतालचा निसर्ग.श्रीमंत म्हाताऱ्यांना गावं जवळ लागतात, आणि त्यापेक्षाही चहूकडे माणसांचा स्पर्श नसलेला निसर्ग लागतो.या दोन गोष्टी दिल्या,तर दर एकरी नफा सगळ्यात जास्त होतो.

"दुसऱ्या पानावर बऱ्याच जमीन व्यवस्थापन आणि रिअल इस्टेट तज्ज्ञांची मतं आहेत.त्यांनाही माणसाचा हात न लागलेल्या जमिनीची जवळीक नफा वाढवतं,असं वाटतं; अगदी एकमत आहे, त्यावर."

"आणि शेवटी मी आपण काय करावं,याबद्दलची माझी योजना मांडली आहे."

रॅफचा योजनेचा गाभा होता,नोकोबीच्या तीरावर मूठभर छोट्या इस्टेटी घडवणं,हा.प्रत्येक घराला तलावापर्यंत जाता येत होतं.सर्व घरांना एक रस्ता जोडत होता,आणि तो चौक्या बसवून पूर्णपणे खाजगी राखला होता.सगळ्या घरांना बोटींसाठी एकच सामायिक धक्का दिला होता.प्रत्येक घराला एकीकडे तलाव आणि दुसरीकडे राखीव जंगल होतं.मध्यमवर्गाला इथे जागा नव्हती,पण श्रीमंतांना श्रीमंती दरानं घरं देऊन कमी खर्चात मूळ अपेक्षित फायदा कमावता येत होता.

"आणि आणखीन एक बाब पाहा.आपण कोणते धोक्यातले परिसर वाचवले,कोणत्या जीवजाती वाचवल्या,याची भरपूर जाहिरात करू शकतो. नोकोबीला प्रसिद्ध करू शकतो.या राज्यात किती विकास कार्यक्रम असल्या कामाचा दावा करू शकतात ? आणि किती जागी घरांमधून पायी जाऊन अशा जाती पाहता येतात ? आपण गव्हर्नरला बोलावू शकतो,उद्घाटनाला ! भरपूर फोटोज् काढल्यानं तोही खूष.आपण जर या योजनेला वनस्पती उद्यान म्हटलं,तर सांभाळेल सरकार,आणि आपल्याला कर कमी करा असं म्हणता येईल!"

('वारुळ पुराण',माधव गाडगीळ',ई.ओ.विल्सन,अनुवाद - नंदा खरे,मनोविकास प्रकाशन )

"आणि मागे त्या मुंग्या मारण्यानं मिळालेली अप-प्रसिद्धीही मिटवून टाकता येईल!"

अखेर कमी कटकटीत मूळ अपेक्षित नफा,या 'अल्टिमेट सेलिंग पॉइंट'वर रॅफचं म्हणणं संडरलंडनं मान्य केलं.उपाध्यक्ष रिक् मात्र दुखावला गेलाच.

शिल्लक भाग पुढील लेखामध्ये..!!