उन्हाळा संपत आला आहे आणि जंगलाचा रागरंग जरा अजब आहे.झाडांचा गर्द हिरवा डेरा आता फिकट पिवळा होत चालला आहे.झाड दमलेलं जाणवतं.ते थकलेलं झाड हा तणावपूर्ण मोसम संपण्याची वाट पाहात आहे.खूप दमछाक झालेल्या दिवशी आपण जसे आराम करायची संधी शोधतो,तीच अवस्था आता झाडांची असते.
ग्रिझ्ली अस्वल आणि डोरमाऊस हे दोन्ही प्राणी निष्क्रिय अवस्थेत झोपून राहतात. रात्रभर पार्टी करून घरी आल्यावर आपली जी अवस्था होते, तसं तर त्यांचं होत नसेल? याची तुलना ग्रिझ्ली अस्वलाशी करता येईल.हा प्राणी झाडांप्रमाणेच आपले धोरण ठेवतो. उन्हाळाभर भरपूर खाऊन तो शरीरावर चरबीचा जाड थर चढवतो,
यामुळे हिवाळा सुसह्य होऊ शकतो.झाडे पण अगदी असंच करतात.अर्थात त्यासाठी त्यांना ब्लूबेरी फळ किंवा सालमन मासा खावा लागत नाही.त्यासाठी त्यांना फक्त सूर्याकडून ऊर्जा घ्यावी लागते आणि त्यापासून साखर व इतर गोष्टी बनवून ठेवाव्या लागतात.
अस्वलासारखेच ते आपल्या सालाखाली याचा साठा करतात.पण ते लठ्ठ होत नाहीत,मात्र त्यांच्या हाडांची,म्हणजे लाकडाची वाढ होते.तयार झालेले अन्न आपल्या ऊतींमध्ये साठवलं जातं.अस्वल जे मिळेल ते खात सुटतं,पण झाडांना मात्र एका मर्यादेपर्यंतच अन्न घेता येतं.
द हिडन लाईफ ऑफ ट्रीज
पी ट र वो ह्ल ले बे न
अनुवाद - गुरुदास नूलकर
अरविंद घनश्याम पाटकर
मनोविकास प्रकाशन
ऑगस्ट महिन्यानंतर रानटी चेरी,बर्ड चेरी किंवा रानटी सेवा देणाऱ्या झाडांकडे बघून तुम्हाला हे स्पष्ट दिसेल. ऑक्टोबरपूर्वी अनेक दिवस भरपूर ऊन असले तरीही ते आता लाल होण्यास सुरुवात होते.याचा अर्थ आता त्यांचे दुकान वर्षाअखेरीपर्यंत बंद राहणार. सालाखालची जागा आणि मुळं आता अन्नसाठ्याने भरून गेलेली असतात.
अधिक साखर बनवली तर ती साठवण्यासाठी आता जागा नाही.यानंतरच्या काळात अस्वलं जरी खात राहिली तरी झाडांना आता निद्राअवस्थेत नेण्यासाठी सँडमॅन आलेला असतो.
या झाडांव्यतिरिक्त इतर बहुतांश झाडांना अन्नसाठा करण्यासाठी अधिक जागा उपलब्ध असते.त्यामुळे ते प्रकाश संश्लेषण चालू ठेवून बर्फ सुरू होईपर्यंत अन्नसाठा करत राहतात.त्यानंतर मात्र त्यांना सर्व काम बंद ठेवावे लागते.याचं एक कारण म्हणजे पाणी. झाडाचे 'रक्त'च गोठले तर काहीच करता येत नाही आणि परिस्थिती बिकट होऊ लागते.हिमवृष्टी सुरू झाल्यावर जर लाकडात खूप पाणी शिल्लक असेल तर गोठलेल्या नळासारखं ते फुटू शकतं.आणि म्हणूनच अनेक प्रजाती स्वतःच्या लाकडातून आर्द्रता कमी करू लागतात.हे साधारण जुलै महिन्यात सुरू होतं.
पण असं करूनही झाडं हिवाळ्यासाठी तयार झालेली नसतात,त्याला दोन कारणे आहेत.पहिलं कारण म्हणजे,चेरीच्या कुळातली झाडं सोडून इतर प्रजाती उन्हाळ्याचे शेवटचे दिवस ऊर्जा साठवण्यासाठी वापरतात.आणि दुसरं कारण म्हणजे अनेक प्रजातींचं एक काम बाकी असतं,ते म्हणजे ऊर्जेचा साठा पानाकडून खोड आणि मुळांकडे नेऊन ठेवणं.आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे त्यांना अजून आपल्या हिरव्या रंगाच्या क्लोरोफिलचे विभाजन करून ठेवणं बाकी असतं.असं केलं तरच त्यांना येत्या वसंत ऋतूमध्ये नवीन पालवीला क्लोरोफिल वाटप करता येणार असतं. पानातून हिरवा रंगद्रव्य गेला की आधीपासून असलेले पिवळे आणि तपकिरी रंग पानावर चढतात.कॅरोटीनने बनलेले हे रंग बहुतेक संकटात असल्याची घोषणा जाहीर करत असावेत.आता याच सुमारास अफिड आणि इतर कीटक खोडांमध्ये भेगा शोधू लागतात. येणाऱ्या थंडीपासून तिथेच त्यांना सुरक्षा मिळणार असते.सशक्त झाड आपल्या उत्तम तब्येतीची जाहिरात करण्यासाठी उजळ रंगाची पानगळीची पालवी धरतात. अफिड आणि इतर कीटकांना हा संदेश बरोबर समजतो.सशक्त झाडे अधिक विषारी द्रव्य बनवू शकतात ज्यामुळे त्यांच्या पिल्लांना धोका निर्माण होतो. आणि म्हणून हे कीटक आकर्षक न दिसणाऱ्या झाडांच्या शोधात असतात.
पण एवढी उधळपट्टी कशाला करायची? हीच गोष्ट वेगळ्या रितीने हाताळता येते,हे काही सूचीपर्णी झाडे दाखवून देतात.दरवर्षी नवीन पालवी धरण्यापेक्षा ते आपली हिरवी पालवी तशीच ठेवतात.आणि ही सूचीपर्णी पानं थंडीमध्ये गोठू नये यासाठी एक विशिष्ट द्रव्य त्यात सोडलं जातं.तसेच पानातून बाष्पोत्सर्जन रोखण्यासाठी त्यांच्यावर मेणाचा थर चढवला जातो. अधिक सुरक्षा म्हणून पानाची कातडी टणक असते व श्वासोच्छ्वास करणारी छिद्रं खोल खालच्या बाजूला असतात.या सर्व सावधगिरीमुळे झाडातून फार पाणी बाहेर जात नाही.कारण पाण्याचा साठा संपला तर गोठलेल्या जमिनीवरून झाडाला पाणी घेणे शक्य नसते.झाड सुकून जाण्याची भीती असते.
पण सूचीपर्णी पानांपेक्षा रुंदपर्णी झाडाची पानं मऊ आणि नाजूक असतात,म्हणजेच त्यांना स्वसुरक्षा करण्याचं साधन नसतं.म्हणूनच बर्फाची चाहूल लागताच बीच आणि ओक वृक्ष लगेच पानझड करतात. मग या झाडांनी स्वतःच्या उत्क्रांतीत जाड कातडी आणि न गोठण्याची द्रव्यं का बरं तयार केली नसतील? वर्षानुवर्ष लाखो नवीन पानं तयार करून काही महिन्यातच ती झाडून टाकायची,यात फारसा शहाणपणा नाही.परंतु उत्क्रांतीच्या स्पर्धेत हा शहाणपणाच आहे,कारण दहा कोटी वर्षांपूर्वी पानझड वृक्ष पृथ्वीतलावर आले.पण सतरा कोटी वर्षांपासून सूचीपर्णी झाडं इथे आहेत. म्हणजे पानझडी वृक्ष तसे नवीनच. पानं झडून टाकणं हा खरोखरी शहाणपणा आहे कारण यामुळे हिवाळी वादळाच्या तडाख्यात हाडे वाचू शकतात.
ऑक्टोबर महिन्यात मध्य युरोपमध्ये येणाऱ्या या हिमवादळात झाडांना जिवंत राहण्याची कसरतच करावी लागते.ताशी साठ मैल वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यामध्ये मोठी मोठी झाडे उखडून पडतात.आणि काही वर्षे या वेगाचा वारा तर दर आठवड्यालाही येतो. पानझडीच्या काळात होणाऱ्या पावसामुळे जंगलाची जमीन चिखलमय होते आणि झाडांना पुरेसा आधार मिळत नाही.या वाऱ्यामुळे झाडाला सुमारे दोनशेवीस टन वजनाइतका जोरदार धक्का बसतो. ज्या झाडांना स्वतःचा बचाव करता येत नाही, ती वादळात उन्मळून पडून जातात. पण पानझडी वृक्ष मात्र बचाव करू शकतात. त्यासाठी ते आपली सौर ऊर्जा प्रक्रियेची साधनं झडून टाकतात. यामुळे सुमारे बाराशे चौरस यार्ड इतके क्षेत्रफळ झाडवरून नाहीसे होते आणि जंगलाच्या जमिनीवर पडते. हे एखाद्या शिडाच्या जहाजाचे एकशे तीस फूट उंचीचे शीड काढून टाकण्यासारखे आहे.पण इतकंच नव्हे,झाडांचं खोड आणि फांद्या अशा प्रकाराने वाढलेल्या असतात की त्यांच्यामुळे वाऱ्याला कमीत कमी अडथळा होतो.त्यांची रचना एखाद्या आधुनिक मोटार गाडीसारखीच असते.
त्याउपर,पूर्ण झाड इतकं लवचीक असतं की वाऱ्याचा जोरदार तडाखासुद्धा त्यांना आपल्या शरीरात एकसारखा विभागून सहन करता येतो.अशा सर्व बचावयुक्तींमुळे झाडांना हिवाळ्यामध्ये तग धरता येते.पाच-दहा वर्षांमध्ये एकदा येणाऱ्या प्रचंड मोठ्या चक्रीवादळाला तोंड देताना जंगलातली सर्व झाडे एकमेकांच्या मदतीस उभी राहतात.प्रत्येक झाडाचा बांधा वेगळा असतो.प्रत्येकाच्या लाकडातील तंतू वेगळ्या पद्धतीचे असतात.म्हणजे वाऱ्याचा पहिली झोत आल्यावर प्रत्येक झाड एकाच दिशेला वाकणार असते पण पुन्हा सरळ होण्याचा प्रत्येकाचा वेग वेगळा असतो.पहिला झोत धोक्याचा नसतो.पण वाकडं झालेल्या झाडाला दुसऱ्या झोताचा धोका असतो. सशक्त जंगलामध्ये एका झाडाची दुसऱ्याला मदत होते. एक झाड वाकलेले राहिले तरी त्याच्यामागचे झाड पुन्हा सरळ होण्याच्या मार्गावर असते.यामुळे दोन्ही झाडांचे हलणे कमी होते.वाऱ्याचा पुढचा झोत यायच्या आत जंगलाची हालचाल अगदी संथ झालेली असते आणि पुन्हा वारं आणि झाडं यांच्यातील द्वंद्व चालू होते. झाडांचे डेरे मागेपुढे होताना पाहात बसावसं वाटतं. जंगल एकत्रितपणे मागेपुढे होताना दिसतेच,पण प्रत्येक झाडही हलत असल्याची जाणीव होते.वादळात जंगलामध्ये जाणे धोक्याचे आहे,हे मात्र लक्षात ठेवा.
आपण पुन्हा पानझडी कडे वळू.प्रचंड ऊर्जा खर्च करून दर वर्षी नवीन पालवी बनविण्यातच शहाणपणा आहे, याचा पुरावा म्हणजे प्रत्येक हिवाळ्यानंतर झाड जिवंत दिसते.पण याचे काही वेगळे धोकेही आहेत.हिमवृष्टी हा त्यातला एक धोका.बर्फापासून बचाव करण्यासाठी झाडे आपली पानं झडून टाकतात.मगाशी म्हटल्याप्रमाणे बाराशे चौरस यार्ड पाण्याचा पृष्ठभाग नाहीसा झाला की बहुतांश हिमवृष्टी जमिनीवर पडून जाते,थोडीशीच फांद्यांवर साचून राहते.याचा बर्फ झाला की वजन वाढते.
काही वर्षांपूर्वी पारा शून्य अंशाच्या खाली गेला आणि बर्फाची थोडीशी भुरभुर चालू झाली.असे हवामान तीन दिवस राहिले आणि प्रत्येक तासाला माझी जंगलाबद्दल चिंता वाढत गेली.पावसाची भुरभुर फांद्यांवर पडून त्याचा लगेच बर्फ होतो आणि फांद्यांना काही वेळातच ते वजनदार वाटू लागतं.मात्र हे दृश्य विलोभनीय असतं. सर्व झाडे स्फटिकाने सजवल्यासारखी दिसतात.बर्च वृक्षाची काही तरुण झाडे या वजनाने पार वाकून गेली होती.त्यांची मी आशाच सोडून दिली.आणि प्रौढ वृक्षांमध्ये डग्लस फर आणि पाईन या सूचीपर्णी वृक्षांच्या दोन तृतीयांश फांद्या बर्फाच्या वजनाने मोडून गेल्या होत्या.यामुळे ती झाडं अतिशय.अशक्त झाली होती.त्यांना आपला डेरा पुन्हा वाढविण्यासाठी काही दशकं लागणार होती.पण त्या तरुण वाकलेल्या बर्च झाडांचं मला जरा आश्चर्य वाटतं.
त्यांच्यावरचा बर्फ वितळून गेल्यावर सुमारे ९५ टक्के खोडं परत सरळसोट उभी राहिली.काही अर्थातच पुन्हा जागेवर आले नाहीआणि कालांतराने त्यांचं कुजलेलं खोड मोडून गेलं.आता जंगलाच्या मातीसाठी त्यांचा सेंद्रिय माल होत चालला आहे.
तर मग मध्य युरोपच्या अक्षांशांवर तग धरण्यासाठी पानझड हे एक प्रभावी तंत्र आहे असं म्हटलं पाहिजे. आणि यामुळे झाडांना आपला कचराही झडून टाकता येतो.झोपायच्या आधी आपण जसे स्वच्छतागृहात एक चक्कर मारून येतो,तसेच झाडांनाही झोपण्यापूर्वी नको असलेला कचरा टाकून द्यायचा असतो.
आणि हा कचरा पानझडीमधून जमिनीवर पडतो. पानझड करण्यासाठी ऊर्जा लागते,त्यामुळे ते संपल्याशिवाय झाडाला झोपी जाता येत नाही.एकदा का उपयुक्त द्रव्याचा सगळा साठा पानातून खोडाकडे वळवला की मग जाड ऊतींचा थर बनवून झाड त्या पानाचा फांदीशी असलेला संपर्क बंद करून टाकते. आता वाऱ्याची एक झुळूक जरी आली तरी पान गळून पडतं.सर्व पाने गळून गेली की मगच झाडाला विश्रांती मिळते.त्यांना विश्रांतीची नितांत गरज असते कारण आधीच्या मौसमात त्यांची दमछाक झालेली असते. झोप मिळाली नाही की जसा माणसांना त्रास होतो तसाच झाडांनाही होतो.निद्रानाशापासून जीवाला धोका उद्भवतो.आणि म्हणूनच जर आपण ओक किंवा बीचच्या झाडाला खोलीत वाढवायचा प्रयत्न केला तर ते मरून जातात.इथे त्यांना विश्रांती मिळत नाही आणि वर्षभरातच ते मरू शकतात.
मात्र आपल्या पालकांच्या सावलीत वाढणाऱ्या रोपट्यांची पानझड वेगळ्या प्रकारची असते.त्यांचे पालक जेव्हा पानझड करतात तेव्हा एकदम त्यांच्यापर्यंत भरपूर सूर्यप्रकाश पोचू लागतो.याचा फायदा घेऊन रोपटी ऊर्जा उत्पादनात गुंतून जातात. आणि मग पहिली हिमवृष्टी झाली की चकितच होतात. रात्रीचे तापमान २३ अंश फॅरनहाईटपेक्षा खाली गेले तर मात्र त्यांना जांभया देत निष्क्रिय पडून राहण्याशिवाय इलाज नसतो.आता पानझड करण्यासाठी ऊतींचे थर बनवून त्यांना बिलगून ठेवण्याची वेळ निघून गेलेली असते.आणि असं नाही केल तर पानझड शक्य नसते.ही रोपटी लहान असल्यामुळे त्यांना वाऱ्यापासून आणि बर्फापासून फारसा धोका संभवत नाही.
वसंत ऋतूमध्ये ही रोपटी अशीच अजून एक संधी साधतात.मोठ्या वृक्षांना पालवी फुटायच्या दोन आठवडे आधी त्यांची पालवी फुटते.यामुळेत्यांना भरपूर सूर्यप्रकाश घेता येतो.त्या रोपट्यांना हे कळतं कसं? आपल्या पालकांना पानफुटी कधी होणार याची तारीख काही त्यांना माहीत नसते.त्यांच्या आसपासची जमीन ऊबदार होऊ लागली की ही चाहूल त्यांना लागते. जंगलांतल्या जमिनीवर वसंतातली ऊब आधी पोहोचते. झाडांच्या डेरेदार वरच्या भागापेक्षा दोन आठवडे आधी! त्या उंचीवर दिवसा जोराचे वारे असतात आणि रात्री गारठते. त्यामुळे तिथे ऊब धरायला उशीर होतो.विशाल वृक्षांच्या डेरेदार सुरक्षाकवचामुळे जंगलातल्या जमिनीवर बर्फ कमीच पोहोचतो.त्याच बरोबर जमिनीवर पानगळीचा जाड थर विघटन होत असतो,
त्यामुळेही जमीन उबदार राहते आणि जमिनीचा पारा वर चढायला मदत मिळते.शरद ऋतूमध्ये रोपट्यांना सूर्यप्रकाशाचा फायदा मिळालेले दिवस बघता,त्या तुलनेत यांना वसंत ऋतू सुरू होण्यावेळी एक पूर्ण महिना मुक्त वाढीसाठी मिळतो.म्हणजे त्यांच्या वाढीच्या काळात २० टक्क्यांची भर पडते.हे काही वाईट नाही ! पानझडी वृक्षांमध्ये काटकसरीने राहण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत.पानझडीच्या आधी बहुतांश प्रजाती पानांमधून ऊर्जा परत फांद्यांत आणून ठेवतात.पण काही प्रजाती याकडे दुर्लक्ष करतात.उदाहरणार्थ, अल्डर वृक्ष उद्याची चिंता न करता स्वतःची हिरवीगर्द पानं झडून टाकतात.पण ही प्रजाती जास्त करून पोषणयुक्त दलदलीच्या प्रदेशात वाढते,त्यामुळे त्यांना दरवर्षी नवीन क्लोरोफिल बनवणे जड नसते.त्यांच्या पायाशी वाढणारी बुरशी आणि सूक्ष्मजीव त्यांच्या पडलेल्या पानांचे विघटन करून झाडाला पोषणद्रव्य उपलब्ध करून देतात.
झाडाला फक्त हे मुळातून घेऊन पुन्हा नवीन क्लोरोफिल बनवायचे असते.नत्रच्या पुनरुज्जीवनाचीही त्यांना काळजी नसते,कारण मुळांवर असलेल्या गुठळ्यांत असणारे सूक्ष्मजीव सतत याचा पुरवठा करीत असतात.दर वर्षी एक चौरस मैलाच्या अल्डर वृक्षाच्या जंगलातून सुमारे ८७ टन नत्र हवेतून घेऊन त्याचा पुरवठा मित्र वृक्षांना केला जातो.बहुतांश शेतकरी जितके नत्र शेतात वापरतात त्यापेक्षा हे जास्त आहे.म्हणजे अनेक प्रजाती काटकसरीने राहतात त्याउलट अल्डर वृक्ष आपल्या संपत्तीचे प्रदर्शन करतात.अॅश आणि प्रौढ वृक्षही असेच वागतात.हे उधळे आपली हिरवी पानं झडू देतात आणि शरद ऋतूत विविध रंगाने नटणाऱ्या झाडांच्यात त्यांचा नंबर लागत नाही.तर मग स्वभावाने कंजुष असलेली झाडेच रंगबिरंगी असतात,असं दिसतंय.पण हे अर्धसत्य आहे. क्लोरोफिल काढून घेतल्यावर पानांवर पिवळा,केशरी आणि लाल रंग दिसू लागतो.पण हे रंग ज्यामुळे येतात ते कॅरोटिन आणि अॅन्थोसायनिन सुद्धा काही वेळातच विघटन होऊन बदलणार असतात.ओकचे वृक्ष मात्र अत्यंत सावधपणे सर्व द्रव्य काढून घेतात आणि फक्त तपकिरी पानं झडू देतात.म्हणजेच प्रत्येक झाड वेगळ्या पटीने खर्चीक असते.बीचची पाने तपकिरी आणि पिवळी झाली की झडतात पण आनंदी चेरी झाडांची पानं मात्र लाल असतानाच झडून जातात.
आता शेवटी सूचीपर्णी झाडांकडे वळू.त्यांच्याबद्दल मी फार बोललो नाही पण या गटात पानझडी वृक्षांसारखे पानगळ करणाऱ्या तीन प्रजाती आहेत लार्च,बाल्ड सायप्रस आणि डॉन रेडवूड.हे तिघे पानझडी वृक्षासारखे का वागतात, याची मला खरंच कल्पना नाही.कदाचित असंही असेल की उत्क्रांतीच्या शर्यतीत हिवाळ्यावर मात करण्याचा सर्वोत्तम मार्ग किती सावधगिरीने बाळगावी हे अजून निश्चित झालं नसावं.वसंत ऋतूमध्ये सूचीपर्णी पानं टिकवून ठेवणं हे नक्कीच फायद्याचं असतं.कारण नवीन पान उगवण्याची वाट न पाहता झाडाला आपली अन्नउत्पादनाची क्रिया लगेच चालू करता येते.पण वसंतातल्या उन्हाने अनेक नवीन कोवळे कोंब सुकून जातात जेव्हा मोठ्या झाडांचे वरचे डेरे वसंतातल्या उन्हाने छान गरम झालेले असतात.पण जमीन अजूनही थोडी गारठलेली असते.नवीन कोंब अशा वेळेस प्रकाश संश्लेषण सुरू करण्याची घाई करतात आणि सुकून जातात.त्यांना बाष्पोत्सर्जन थांबविता येत नसल्यामुळे धोक्याची चाहूल लागताच सूचीपर्णी पानं लुळी पडतात. विशेषतःगेल्या वर्षीच्या पानांचे असे होते,कारण त्यांच्यावर मेणाचा जाड थर नसतो.
या तिघांच्या व्यतिरिक्त स्प्रूस,पाईन,फर आणि डग्लस फर ही झाडंसुद्धा आपल्या सुया बदलतात, कारण त्यांना कचरा साफ करायचा असतो.सर्वांत जुन्या सुया ते प्रथम बदलतात कारण इजा होऊन त्यांची कार्यक्षमता कमी झालेली असते. जोपर्यंत ही झाडं सशक्त असतात तोपर्यंत फर दहा वर्षांसाठी, स्प्रूस सहा आणि पाईन तीन वर्षांसाठी आपल्या सूचीपर्णी पानांचा साठा करून ठेवतात.दोन फांद्यामधील वाढ होण्याच्या अंतराकडे पाहून हे लक्षात येते.पण पाईनची झाडं थंडीमध्ये विरळ दिसू लागतात, कारण ते एक चतुर्थांश पानं झडून टाकतात.वसंतात पुन्हा वर्षभर पुरतील इतक्या सुया वाढतात आणि झाडाची वाढ होते.आता मात्र झाड पुन्हा सशक्त दिसू लागते.
●●● समाप्त ●●●