* विजय गायकवाड | Vijay Gaikawad

live

नमस्कार आपले स्वागत आहे. मी पुस्तके आणि मित्रांवर पैसे खर्च करतो,माझ्याकडे दगड आणि विटांवर खर्च करण्यासाठी पैसे नाहीत.- रस्किन बाँड.ही थोर माणसं व त्यांचे विचार मला पुस्तकात भेटलीत.ती भेटली आणि त्यांनी सांगितले कि, प्रत्येक दिवशी असं काही तरी करा की,ते तुम्हाला अधिक सुंदर उद्याच्या दिशेने खूप लांबवर घेऊन जाईल."- डोग फायरबाऊ.' सर्वियन कादंबरीकार मिलोराद पावीच यांचे एक वाक्य आहे ते म्हणतात - जोवर जगात पुस्तक वाचणाऱ्या वाचकांची संख्या बंदूकधारी सैनिका पेक्षा अधिक आहे तोवर काळजीच काहीच कारण नाही.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात.पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये.म्हणून अविरतपणे प्रयत्न करणारे मार्गदर्शक, मित्र धावून येतात.प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,डॉ.दीपक शेटे,आ.भरत बुटाले,प्रा.सर्जेराव राऊत,सुभाष ढगे,अनिल फारणे,डॉ.सुधीर सरवदे ,विश्वास खाडे, विनायक पाटील,संजय कुंभार,सतीश खाडे,मनोहर सुर्वे,गणेश खंदारे,तात्या गाडेकर, दादासाहेब गाडेकर, दादासाहेब ताजणे, पुस्तकातील घटना प्रसंग सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील यांनी केलेले आहे. मला लिहिण्याची प्रेरणा देणारी पुस्तके,लेखक,प्रकाशक,मित्र ही जगावेगळी माणसं माझ्या जीवनातील महत्वाचा टप्पा आहेत.... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ.मेघा गायकवाड, चिरंजीव मयान,माझ्या धावण्यातील गुरुवर्य नामदेव बरुरे,लुल्ला शेख मोठी ताई ,लहान ताई जयश्री शिंदे या सर्वांचेच मनापासून आभार व धन्यवाद मॅट्रिक फेल विजय गायकवाड

5/29/26

सुखदेव / Sukhdev

रात्री जेवण झाल्यावर बापू ओसरीवर तक्क्याला टेकून पान खायला बसले.थोड्या वेळाने स्वैपाकघरातलं आवरून माईपण बाहेर आल्या.मंदा,मुक्ता आणि यशा आजूबाजूला घुटमळत होते.कारण जेवतानाच बापूंनी म्हटलं होतं की,'माईचं आटोपलं की,मला तुम्हा सगळ्यांशी एका महत्त्वाच्या विषयावर बोलायचं आहे.'

आठवीतला यशा,सहावीतली मंदा अन् चवथीतली मुक्ता ह्या सगळ्यांना आपण खूप मोठं झाल्यासारखं वाटायला लागलं.ह्या आधी कधीच बापूंनी किंवा घरी येणाऱ्या कुठल्याही पाहुण्यांनी त्यांच्याशी कधी कुठल्या विषयावर 'चर्चा' केली नव्हती. उलट घरात काही महत्त्वाची चर्चा चालू असेल तर मुलांना बाहेर पिटाळलं जायचं.त्यातल्या त्यात मंदा अन् मुक्ता ह्यांना तर नक्कीच.कारण यशा काहीतरी निमित्त काढून घरात घुटमळायचा आणि कान पाडून मोठी माणसं काय बोलतात ते ऐकायचा.आज मात्र बापूंनी माईच्या बरोबर त्या तिघांनाही चर्चा करणार असल्याचं सांगितलं.जेवण झाल्यावर मधल्या वेळेत तिघांनी ओट्यावर बसून अंदाज बांधण्याचा प्रयत्न केला.यशा त्यांच्यात मोठा.तो म्हणाला,

"लक्ष्मी आणि पार्वतीबरोबर आणखी एखादी गाय विकत घेणार असतील."(गावगोत,माधव सावरगांवकर,प्रकाशक - संजय शिंदे - अष्टगंध प्रकाशन..)मंदाला वाटलं,

अभ्यासाबद्दल काही तरी असेल.'जास्त मार्कस मिळवायला पाहिजे' वगैरे काही तरी सांगणार असतील.

मात्र बापूंनी अनपेक्षितपणे धक्काच दिला ! बापूंना एका वर्षासाठी मुंबईच्या ऑफिसमध्ये कामासाठी जावं लागणार होतं.आजच ही गोष्ट त्यांना समजली होती.ती ऐकून माईसकट सगळ्यांनाच धक्का बसला.बापूंशिवाय घर ही कल्पनाच कुणी केली नव्हती! माईना तर काही बोलणंच सुचेना.

"अहो पण,हे कसं शक्य आहे? मी एकटी ह्या कच्चाबच्चांना घेऊन सगळं कसं सांभाळणार ? दुसरा काही मार्ग नाही का ?"

माईचंदेखील खरंच होतं.माईंचं जग उंबरठ्याच्या आतच सीमित होतं.बाहेर जाणं म्हणजे मंगळवार-शुक्रवार देवीला,शनिवारी शनिमंदिरात.एवढाच त्यांचा बाहेरच्या जगाशी संबंध यायचा.घरी सकाळपासून देवाची स्तोत्रं म्हणत,भूपाळ्या म्हणत,सडासंमार्जन,घराची झाडझूड, पार्वती-लक्ष्मी ह्या दोघींची निगा राखणं,त्यांचं चारापाणी बघणं अन् सगळ्यांच्या स्वैपाकाचं पाहणं... ही सगळी कामं माईंची.ह्या व्यतिरिक्त सगळं बापू करत किंवा करवून घेत.बापू रेव्हेन्यू खात्यात मामलेदार होते.त्यांचा दरारा होता.भाजीपाला-वाणसामान आणायला सीताराम चपराशी होता.तोच गुरांसाठी कडबा,घास, पेंड विकत आणून द्यायचा.बापू वर्षभर नसल्यावर आता घर कसं काय चालणार,घरातल्या लोकांशिवाय माईंचं बोलणं फक्त मारवाड्यांशी,रंगीशी आणि गल्लीतल्या इतर बायांशी होत असे.खरं तर,पार्वती आणि लक्ष्मी ह्यांच्याशीच ती जास्त बोलत असे. बापूही तिला म्हणत,'ह्या गायींशी काय तासन्तास बोलत असतेस ग? आणि त्याही तुझं बोलणं समजत असल्यासारखं ऐकतात.'तर सांगायचं असं की,बापू मुंबईला जाणार म्हटल्यावर माईना अन् मुलांना डोक्यावरचं छप्परच गेल्यासारखं वाटू लागलं.बहुदा बापूंना ह्याचा अंदाज आधीच होता. त्यांनी बोलायला सुरुवात केली..

"यशा काही आता लहान नाही.चांगला चौदा वर्षांचा आहे.तो बाहेरचा व्यवहार पाहील.काय हवं नको ते बाजारातून आणील.

तसा सीतारामपण मधूनमधून चक्कर मारील.पण त्याला आताच्या सारखं दररोज यायला काही जमणार नाही.पैशाचे व्यवहारपण आजपासून यशा पाहील."

बापूंनी जानव्यात बांधलेली पेटीची किल्ली यशाला दिली.यशाला आपण एकदमच मोठे झालो असं वाटलं !

"यशा,ट्रंकेत एक चंदनी पेटी आहे,त्यात पैसे आहेत. हिशेब लिहिण्याची वहीपण तुला देतो.त्यात सगळा हिशेब लिहून ठेवायचा.मागच्या महिन्यात सुखदेवने धान्य,गुळाची ढेप अन् चिंच आणून पोहचवलीय. वाणसामान मारवाड्याच्या दुकानातून आणायचं.मी मधूनमधून आल्यावर त्याचा हिशेब चुकता करत जाईन. सुखदेवची मजूरपावती नुकतीच लिहून घेतली आहे.ह्या वेळेला विश्वनाथ अन् राधू 'जमीन कसायला द्या' म्हणून मागे लागले होते.पण सुखदेवकडून मागच्या वर्षीचं धान्य यायचं बाकी होतं अन् गावच्या राजकारणात आपल्याला रस नसल्याने जमीन ह्या वर्षी सुखदेवकडेच ठेवलीय.त्यामुळे ते दोघे- विश्वनाथ अन् राधू नाराज झालेत.सुखदेवसारखीच त्यांचीही जमीन आपल्या शेताला लागून आहे.त्यामुळे त्यांना आपली जमीन कसण्यात स्वारस्य होतं.पण ते आता पुढच्या वर्षी बघू या.सुखदेव चेहऱ्यावरून गरीब वाटतो.पण तरुण असल्याने रांगडा आहे.अर्थात ह्या सगळ्याशी तुमचा काही संबंध येणार नाही.यशा घराकडे, मंदा-मुक्ताकडे नीट लक्ष दे.माईला काय हवं नको ते बघ."बापूंचं हे बोलणं ऐकून माईना हुंदकाच आला. कोंबडी आपल्या पिलांना पंखाखाली घेते तसं त्यांनी यशा-मंदा-मुक्ताला जवळ ओढून घेतलं.

"मुंबई काही लांब नाही.काहीही अडचण आली तर मला पत्र टाका,मी पाठवलेलं उत्तर तुम्हाला आठ दिवसांत मिळेल.चारसहा महिन्यांनी मी इकडे चक्कर मारीनच. काय यशा,जमेल ना तुला?" बापूंनी विचारलं.यशा फुशारून गेला होता.मोठ्या माणसासारखं म्हणाला,“बापू,तुम्ही इथली काही काळजी करू नका."

माई पहिल्या धक्क्यानंतर आता सावरल्या होत्या. यशाला असं मोठ्या माणसासारखं बोलताना पाहून त्यांना खूप बरं वाटलं.

त्याच्या केसांतून हात फिरवत त्या म्हणाल्या,"मोठं झालंय पोरगं.आणि हो,तुम्ही काही काळजी करू नका.गावात अन् गल्लीत आपल्या कुटुंबाबद्दल आदर अन् आपुलकी आहे.वेळप्रसंगाला मध्यरात्रीसुद्धा सगळे धावून येतील.अशोक जरी गाव सोडून मुंबईला गेला असला तरी त्याचे मित्र शंकर,बद्री, पुरुषोत्तम हे आहेत ना.माझी खात्री आहे,तुम्ही इथे नाही हे समजल्यावर तेदेखील अधूनमधून चक्कर मारत जातील.तुम्ही निश्चिंत मनाने जा.मी घर आणि मुलांना सांभाळीन.तुम्ही सांगता ना,तुमचे वडील गेले तेव्हा तुम्ही जेमतेम आठ वर्षांचे होतात.यशा तुमचाच मुलगा आहे. मला त्याची चांगली मदत होईल.शिवाय वरचेवर आम्ही तुम्हाला पत्र पाठवत जाऊ."

झालं.चर्चा संपली.माईच्या मनावर नाही म्हटलं तरी थोडं दडपण आलं.यशाला आपण एकदम खूप मोठं झाल्यासारखं वाटू लागलं आणि मंदा-मुक्ताला आपल्याला काय वाटतंय हे नीटसं समजलं नाही.पण बापू गेल्यावर आपणदेखील माईला कामात मदत करायची असं त्यांनी आपल्या गुप्तचर्चेत ठरवलं.

ठरल्याप्रमाणे पुढच्याच आठवड्यात बापू मुंबईला गेले. साऱ्यांचेच पहिले एकदोन दिवस खूपच अस्वस्थतेत गेले.माईंच्या भाषेत सांगायचं तर सगळ्यांना उघड्यावर पडल्यासारखं वाटायला लागलं आणि असं वाटणं स्वाभाविकच होतं.कारण तिन्ही मुलांसकट घर व्यवस्थित सांभाळण्याची जबाबदारी आता एकट्या माईवर येऊन पडली होती.शिवाय पार्वती अन् लक्ष्मी ह्याही होत्याच.पार्वती गाभण होती.तिचे दिवस भरत आले होते.रात्री-बेरात्री ती अडली तर गवळीवाड्यातून पांडूला बोलवावं लागणार होतं.यशा मात्र अचानक मोठा झाल्यासारखा वागू लागला होता.घराची सगळी जबाबदारी घेण्याचा प्रयत्न करत होता.

बाहेरची सगळी कामं करत होता.माईना त्याचं कौतुक वाटत होतं आणि कधी कधी अवेळी आलेल्या पोक्तपणाच्या त्याच्या भाषेचं त्यांना हसूदेखील यायचं.मंदा-मुक्ता मधूनमधून येऊन माईना काही मदत करू का म्हणून विचारायच्या. खरं तर,बापू इथे नसल्याने पडणाऱ्या कामांपैकी कुठलंच काम त्या करू शकणार नव्हत्या.तरीपण ह्या नव्या परिस्थितीत आपण काही तरी खारीचा वाटा उचलावा ही त्यांची भावना मात्र कौतुकास्पद होती.

एकंदरीत घर व्यवस्थित चाललं होतं.बापूंना मुंबईला जाऊन एक महिना झाला होता.त्यांचं एक पोहचल्याचं आणि नंतर खुशाली विचारणारंही पत्र येऊन गेलं. बापूंच्या पत्रांना उत्तर पाठवणं हा एक मोठा कार्यक्रम असायचा.सगळे एकत्र बसत.माई समोर बसून बापूंशी बोलताहेत अशा स्वरूपाची वाक्यं सांगत.यशा त्याच्या बालबुद्धीप्रमाणे आणि वर्गात पत्रलेखनाच्या तासाला शिकवल्याप्रमाणे त्याचं रूपांतर करी.माईच्या मजकुरात बारीकबारीक गोष्टी विस्ताराने असत.उदाहरणार्थ :

'कालच पार्वती व्यायली.गोऱ्हा झाला.चांगला लांबरुंद आहे.

पांढऱ्या रंगाचा आहे म्हणून मुली 'ढवळ्या' नाव ठेवू या म्हणत होत्या.पण यशाला 'नंद्या' नाव आवडलंय तुम्हाला काय वाटतं? पार्वतीला घुगऱ्या शिजवून घातल्या.ह्या दिवसांत चांगल्या असतात शिवाय काथबोळ पण दुकानातून आणला.तिला कणकेच्या गोळ्यातून दिलाय.काथबोळाने दूध चांगलं सुटतं म्हणतात तेवढंच गोऱ्ह्याचं पोट भरायला बरं.'

मंदा-मुक्तालादेखील आपण घरात केलेल्या मदतीबद्दल लिहावं असं वाटायचं.माईसुद्धा आठवणीने त्या तिघांचं भरपूर कौतुक करणारा भजकूर यशाला सांगत.तो ऐकत असाताना आणि लिहीत असताना त्यांचे फुलून आलेल चेहरे पाहण्यात माईना खूप समाधान वाटे. बापूंच्या उत्तरातदेखील त्या तिघांचं आठवणीने कौतुक केलेलं असे.माईच्याही कौतुकाचा आडवळणाने उल्लेख असे.यशाला त्या अर्धवट वयातही तो लक्षात येई. त्यावेळी तो माईच्या चेहऱ्याकडे पाही.माईसुद्धा कृतकोपाने यशाला म्हणत,"पुढे वाच.मध्येच का थांबलास?आणि इकडे तिकडे काय पाहतो आहेस?" तसा यशा पुढचं पत्र वाचायला लागे.

मंगळवारी गावचा आठवडेबाजार असे.खेड्यापाड्यातले लोक त्यांचं धान्य-भाजीपाला-फळं विकायला घेऊन येत.घरी जाताना वाणसामान,कधी कापडचोपड विकत घेऊन जात.एखादा प्रेमळ लेकुरवाळा पोरांसाठी रेवड्या,गुडीशेव,गुडदाणी कागदात बांधून घेई.खेळण्याच्या दुकानातून एखादी भडक रंगाची पिपाणी किंवा शिट्टी घेऊन पोरांची खूश झालेली तोंडं पाहायला उत्सुक असे.

यशाची शाळा सकाळची असे.बाजाराच्या दिवशी शाळा दोन तास लवकर सुटायची.अशाच एका मंगळवारी यशा शाळेतून घरी आला आणि पिशव्या घेऊन लगेच बाजाराला निघाला.यशाचा बाजार सोप्पा होता.मेथी, टमाटे,दुधीसारख्या स्वस्त भाज्याच तो घेई.

कारण पैसे पुरवून वापरणं ही सध्या त्याची जबाबदारी होती.खाऊ म्हणून तो फक्त केळी घेई.केळी तिथलंच उत्पादन होतं. त्यामुळे स्वस्तही असत.माईंनी सांगितलेला गवताचा भारापण घासाघीस करून घेतला.बाजारात त्याला लांब कुणाशी तरी तावातावाने बोलत असलेला सुखदेव दिसला.तो ज्याच्याशी बोलत होता,त्याला यशा ओळखत नव्हता.यशाने घरी आल्यावर पिशवी रिकामी करताना माईच्या कानावर ही गोष्ट घातली.अर्थात त्यात काही विशेष नव्हतं.पण बापूंनी तिन्ही मुलांना एक गोष्ट आवर्जून सांगितली होती की,'घरात किंवा शाळेत किंवा इतर कुठेही नेहमीपेक्षा काही वेगळी गोष्ट घडली तर ती आठवणीने येऊन माईला सांगायची.कारण तुम्ही लहान आहात.तुम्हाला त्या गोष्टीचं महत्त्व कळणार नाही पण माईला ती गोष्ट महत्त्वाची वाटू शकेल.'

यशाने जेव्हा माईना सुखदेवला कुणाशी तावातावाने बोलताना पाहिल्याचं सांगितलं तेव्हा त्यांनादेखील त्यात विशेष काही वाटलं नाही.आला असेल तो काही खरेदी करायला.घरात लहान मुलंबाळं आहेत.त्यांच्यासाठी काही कापडचोपड खाऊबिऊ घ्यायला.

कदाचित घरी परत जाण्याच्या आधी संध्याकाळी वाड्यावर चक्कर मारून जाईल.संध्याकाळी देवीच्या दर्शनाला जायच्या आधी माईनी यशाला कल्पना देऊन ठेवली अन् म्हटलं,

"बाहेर अंगणातच खेळ.मी नसताना सुखदेव आलाच तर मंदाला सांग चहा करून द्यायला."

माई देवीच्या दर्शनाला जाऊन आल्या.रात्री सगळी जेवायला बसली.तोवर सुखदेव आला नाही.माईंनी विचार केला,झाला असेल उशीर म्हणून परस्पर गेलाही असेल.जेवणं होऊन माई स्वैपाकघर आवरत असताना सुखदेव आला.माईना तो जरा अस्वस्थ वाटला.त्यांनी त्याला तसं विचारलं तर म्हणाला,"विश्वनाथ अन् राघूशी थोडी बोलणी झाली.लई वंगाळ शिव्या दिल्या.”

कथा शिल्लक राहिलेली पुढील लेखामध्ये…!

5/27/26

म्होरक्याचा अस्त / Leader's level

मंकी हिलवर पुन्हा सगळं स्थिरस्थावर झालं होतं. माझं जाणं-येणं पुन्हा पहिल्यासारखंच सुरू होतं. गौरी-राणी-राजीही जणू काही घडलंच नाही असं वागत होत्या.

त्यांच्या दृष्टीने खरोखरच वेगळं काही घडलं नव्हतं.मी त्यांच्या पिल्लाला घाबरवलं होतं आणि त्यावरची प्रतिक्रिया म्हणून त्यांनी माझ्यावर हल्ला केला होता.ही घटना घडून गेल्यावर काही महिन्यांनंतरची गोष्ट असेल.पावसाळ्याचे दिवस होते.एके दिवशी प्रचंड पाऊस लागला होता.मंगळवारचा सुट्टीचा दिवस आणि पावसाचा जोर म्हणून आम्ही सगळ्या माकडांना उबदार इनडोअर सेक्शनमध्ये ट्रॅप करायला लागलो.आत त्यांच्यासाठी हीटिंग लॅम्प लावलेले होते.गौरी,संपत, राणी,राजी,पिल्लं सगळे आत गेले;पण आक्क्याला मात्र काही केल्या आत यायचं नव्हतं.त्याला काय झालं होतं कोण जाणे,दिवसभर तो झाडावरच मुसळधार पावसात भिजत राहिला.रात्रही तशीच गेली.सकाळी ज्याची भीती होती तेच झालं.मंकी हिलपाशी येऊन पाहिलं तर आक्क्या तापाने फणफणलेला.त्याला लगेच पार्कच्या हॉस्पिटलमध्ये भरती केलं;पण इतका वेळ पाण्यात भिजल्यामुळे त्याला न्युमोनिया झाला.काही केल्या ताप उतरेना.उलट वाढतच गेला.आमच्या ध्यानीमनी नसताना आठ दिवसांत तो गेलाच.

आक्क्याच्या जाण्याने मंकी हिल हादरून गेलं. आक्क्या बरा होऊन परत येईल,या आशेवर गौरी सतत हॉस्पिटलकडे डोळे लावून होती.आक्क्या गेल्यानंतर दोन-तीन आठवडे गौरीची आशा कायम होती. आक्क्याच्या जागेवर बसून ती आक्क्याला नेलं त्या दिशेकडे टक लावून बघत राहायची.आक्क्या आणि गौरीचं बाळ (म्हणजे मोबाइल) आता वर्षाचं झालं होतं. राजीचा चिकूही आईला सोडून थोडाफार हिंडू फिरु लागला होता.राणीचा भिकू मात्र तान्हाच होता.भिकू हा संपतचा मुलगा.तोही संपतसारखाच भित्रा होता. आक्क्याविना असतोच.तो साधारणपणे इतरांपेक्षा दाणगट,टग्या असतो.बहूधा तो नरच असतो.त्यामुळेच या पदाला अल्फा मेल असंही म्हणतात.टोळीचे महत्त्वाचे निर्णय त्यानेच घ्यायचे असतात.एखादा शत्रू आला तर त्यानेच हल्ला करणं अपेक्षित असतं.मंकी हिलवरच्या कुठल्याही पिल्लावर एखादी घार किंवा अन्य शिकारी पक्षी झेपावला,तर आक्क्याच त्याचा हल्ला परतवून लावत असे.आक्क्याची जागा घ्यायला भित्रा संपत सक्षम नव्हता.त्याचा पिंडच आज्ञा स्वीकारण्याचा होता.पांडू असता तर नक्कीच त्याने ही जागा भरून काढली असती.पण तो तर केव्हाच पळून गेला होता.आम्ही आता या टोळीकडे अधिक कुतूहलाने पाहू लागलो.आक्क्या आपल्या नेहमीच्या फांदीवर बसून रुबाबात फांदी गदागदा हलवत आपले वर्चस्व सिद्ध करत असे.त्या जागेवरून परिसराची टेहेळणी करत असे.आक्क्याच्या निधनानंतर गौरी आता त्याच्या जागेवर बसून राहू लागली.

एकदा पार्कबाहेरच्या रस्त्यावर भटकी कुत्री पकडायची गाडी आली आणि गौरीने त्याच जागेवरून आक्क्यासारखाच ख्व्यॉक व्यॉक आवाज काढून आपल्या कंपूला धोक्याचा इशारा दिला.

आम्हाला आश्चर्य वाटलं आणि तिच्या त्या समंजस वागण्याचा आनंदही झाला.एके काळची लाजरी-बुजरी गौरी आता चक्क टोळीची 'अल्फा' झाली होती.

माकडांच्या कंपूला आता गौरीच्या रूपाने 'अल्फा फिमेल' मिळाली आणि इतरांनीही बिनबोभाट तिचा स्वीकार केला.माकडांसाठी वाढलेल्या जेवणाचा पहिला मान गौरीला मिळू लागला.स्वभावाने लाजरी असली तरी मुळात ती अंगापिंडाने इतर माकडिंणींपेक्षा,अगदी संपतपेक्षाही तशी मजबूत होती.आश्चर्य म्हणजे टोळीचं म्होरकेपद स्वीकारल्यावर गौरीचा आहारही बदलला. सर्वांसाठी दिलेल्या खाण्यातले चांगलेचुंगले पदार्थ वेचून ती खाऊ लागली शिवाय आहाराचं प्रमाण वाढलं. त्यामुळे वजनही वाढलं.स्वभावात जरब आणि आक्रमकता आली.गौरी टीम लीडर झाल्यामुळे अर्थातच तिने मोबाइलवर लक्ष केंद्रित केलं.आक्क्याचा मुलगा असल्याने त्याला टोळीत विशेष स्थान होतं. त्यामुळे लवकरच त्याने आपल्या आईच्या डेप्युटीची जागा घेतली आणि संपत आपसूकच तिसऱ्या स्थानावर गेला.आणखी एक वर्ष गेलं. (सोयरे - वनचरे - अनिल खैर,समकालीन प्रकाशन)

या काळात गौरीने मोबाइलला चांगलंच तयार केलं. तिलाही न जमणाऱ्या कसरती त्याच्याकडून करवून घेतल्या;घार,घुबड व अन्य पक्ष्यांचे हल्ले परतवून लावायला शिकवलं.बापाचे नेतृत्वगुण त्याच्या स्वभावात होतेच.लवकरच मोबाइल पूर्ण प्रौढ झाला.रुंद खांदे, प्रचंड ताकद,चमकदार केसांचा कोट,अत्यंत सावध नजर आणि धाडसी स्वभाव.या टोळीचा पुढचा म्होरक्या हाच,हे आम्हाला कळून चुकलं.त्याप्रमाणे एके दिवशी सहजच त्याने आक्क्याच्या जागेवर जाऊन व्याँक.. ळ्याँक अशी आरोळी ठोकली आणि गौरीसकट सगळ्यांनी त्याच्या नेतृत्वाला मान्यता दिली आणि आमचा छोटा मोबाइल मंकी हिलचा अल्फा मेल झाला. 

थोडक्यात बचावलो…

नोव्हेंबर महिन्यातल्या एका गुरुवारी सर्पकुंडाचं काम करणाऱ्या गणपतची साप्ताहिक सुट्टी होती.राऊतलाही यायला आज उशीर झाला होता.सर्पकुंडामध्ये थोडा कचरा पडलेला दिसला.पाणीही गढूळ झालं होतं. म्हणून मी सर्पकुंडामध्ये उतरून साफसफाई करू लागलो.पाणी बदलून होत असतानाच चिखलीमधल्या मैला शुद्धीकरण केंद्रातील एक कर्मचारी घाईगडबडीत आला अन् म्हणाला,"साहेब,आमच्या प्लांटवर साप आल्याती.चला चला,लवकर चला." मी पिटबाहेर आलो,साप पकडण्याची हुक स्टिक घेतली आणि त्याच्यासोबत निघालो.मैला शुद्धीकरण प्लांटवर त्या वेळेस गांडूळखत प्रकल्प चालू होता.कुजणारा कचरा,पालापाचोळा,त्यातून निर्माण होणारे सूक्ष्म कृमी,ते खाण्यासाठी येणारे पक्षी, उंदीर आणि उंदरांच्या मागावर येणारे साप असं सगळं पोषक वातावरण होतं.तिथल्या पाचोळ्यामध्ये घोणस जातीच्या सापांची जोडी शांतपणे विसावली होती.नर साधारण तीन फूट लांबीचा होता.त्याला हुक स्टिकने अलगद पकडून पिशवीमध्ये ठेवला.त्या गडबडीत मादी तिथे पडलेल्या फूटभर व्यासाच्या सिमेंट पाइपमध्ये जाऊन दडली.तिथल्या लोकांना एका बाजूकडून पाइप उचलायला सांगून दुसऱ्या बाजूकडून साप बाहेर येण्याची सावधपणे वाट पाहू लागलो.

अपेक्षेप्रमाणे ती मादी माझ्याकडच्या बाजूला वेगाने बाहेर आली.सुमारे साडेतीन फूट लांबी,त्रिकोणी डोकं,तपकिरी रंग आणि त्यावर ठळक बदामी रंगाचे ठिपके.अतिशय चपळ होती ती.मी आजवर हाताळलेल्या घोणसांपेक्षा ती जरा वेगळीच वाटली.हुक स्टिकच्या साहाय्याने तिला उचलेपर्यंत ती तीनदा निसटली.मोकळ्या जागेतून ही बया झाडाझुडपांमध्ये गायब झाली असती तर पुन्हा सापडणं अवघड झालं असतं.म्हणून मी एका झटक्यातच डाव्या हाताने तिचं शेपूट धरून तिला मोकळ्या जागेत आणली.हुक- स्टिक तिच्या समोर धरली.तेवढ्यात ती झटकन वळली आणि हुक-स्टिकला चकवून तिने माझ्या गुडघ्यावर हल्ला केला. तिचा उजवा विषदंत पँटच्या कापडातच अडकला,पण डावा विषदंत मात्र पँटमधून गुडघ्यापर्यंत पोचलाच. तिला चावण्यासाठी म्हणावी तशी ग्रिप मिळाली नसली तरी थोडं तरी विष पसरलं असणारच.मी एका क्षणात पँट काढली आणि शेजारीच असणाऱ्या अनिल राऊतकडे स्टिक दिली.साप पकडण्याचं काम त्याच्यावर सोपवून मी बाहेर धावलो.

दरम्यान,तिथल्या प्लांटवरचे एक अभियंता संजय खाबडे त्यांची कार घेऊन आले. गाडीत मी कसाबसा बसलो.त्यांच्या मोबाइलवरून मी आधी अण्णाला फोन लावला.वायसीएमला अ‍ॅडमिट व्हायला सांगून त्याने मला धीर दिला आणि सूत्रं हातात घेतली.त्यानंतर तो सतत खाबडेसाहेबांच्या संपर्कात होता.

दरम्यान,मी पालिका आयुक्तांच्या ऑफिसमध्ये फोन करून जे घडलंय त्याची कल्पना दिली.हॉस्पिटलमध्ये पोहोचण्याआधी अण्णाचा पुन्हा फोन आला, वायसीएमएला अँटिव्हेनम इंजेक्शन तयार आहे. त्यापाठोपाठ आयुक्तांच्या पीएचाही फोन,डॉ.फडणीस आणि इंजेक्शन्स तयार आहेत.लवकरात लवकर पोहोचा.पंधरा मिनिटांत आम्ही हॉस्पिटलमध्ये पोहोचलो.तोवर उजवा पाय पूर्ण आखडून गेला होता. मला स्ट्रेचरवरूनच आत न्यावं लागलं.

अँटिव्हेनम देण्याआधी त्याची टेस्ट करावी लागते.त्यानुसार टेस्ट डोस देऊन अर्ध्या-पाऊण तासाने इंजक्शन दिलं गेलं. डॉ.फडणीस सोबत होतेच.अण्णाही सतत फोनवर होता.थोड्या वेळात आमचा मित्र डॉ.अमित कामतही दाखल झाला.'सर,काळजी करू नका सर्व काही ठीक होईल.मी आता तुमच्यासोबतच थांबणार आहे', असं त्याने म्हटल्यामुळे मी खरोखरच शांत झालो.

अजूनही माझं रक्ताभिसरण,हृदयक्रिया आणि मूत्रपिंडाचं कार्य सगळं व्यवस्थित चालू होतं.ते पाहून डॉ.फडणीस म्हणाले "विषाचा परिणाम आता म्हणावा तसा राहिलेला नाही.धोका टळलेला दिसतोय.पण तरी पुढच्या अड्डेचाळीस तासांसाठी कीप युवर फिंगर्स क्रॉस्ड !"

अड्ठेचाळीस तासही उलटले.मी त्या सर्पदंशातून सुखरूप बचावलो.साप हाताळण्याचा इतक्या वर्षांचा अनुभव असला तरी प्रत्येक प्रसंगातून काही तरी शिकता येतं.कारण कितीही सावधगिरी बाळगली तरी सर्पदंशाला सामोरं जावं लागू शकतं.मग तुम्ही साप हाताळत असा किंवा नसा.पण तशी वेळ आली,तर

मानसिक संतुलन बिघडू न देता शांत राहणं महत्त्वाचं असतं.वेळ न दवडता हॉस्पिटलमध्ये जाणं अत्यावश्यक असतं.त्या दिवशी गुडघ्याच्या वाटीऐवजी आजूबाजूला दुसऱ्या विषदंताचा दंश झाला असता तर माझ्या शरीरात दुप्पट विष भिनलं असतं.नाग आणि मण्यार यांचं विष मज्जासंस्थेवर परिणाम करणारं असतं,तर घोणस आणि फुरसं यांचं विष शरीरातील रक्ताभिसरणावर परिणाम करतं.निसर्गप्रेमींच्या,पशू-पक्षी-प्राणी आणि सर्पमित्रांच्या जागरुकतेमुळे वन्य-जीवांचं संरक्षण मोठ्या प्रमाणात होत आहे.पण त्याचबरोबर वन्य जीव हाताळताना त्यांनीही खूपच सावधगिरी बाळगण्याची गरज असते. माझ्याच उदाहरणावरून मी हे नक्की सांगू शकतो. "

●●● समाप्त ●●●

5/25/26

निष्क्रिय कालावधी (हायबरनेशन) / Inactive period (hibernation)

उन्हाळा संपत आला आहे आणि जंगलाचा रागरंग जरा अजब आहे.झाडांचा गर्द हिरवा डेरा आता फिकट पिवळा होत चालला आहे.झाड दमलेलं जाणवतं.ते थकलेलं झाड हा तणावपूर्ण मोसम संपण्याची वाट पाहात आहे.खूप दमछाक झालेल्या दिवशी आपण जसे आराम करायची संधी शोधतो,तीच अवस्था आता झाडांची असते.

ग्रिझ्ली अस्वल आणि डोरमाऊस हे दोन्ही प्राणी निष्क्रिय अवस्थेत झोपून राहतात. रात्रभर पार्टी करून घरी आल्यावर आपली जी अवस्था होते, तसं तर त्यांचं होत नसेल? याची तुलना ग्रिझ्ली अस्वलाशी करता येईल.हा प्राणी झाडांप्रमाणेच आपले धोरण ठेवतो. उन्हाळाभर भरपूर खाऊन तो शरीरावर चरबीचा जाड थर चढवतो,

यामुळे हिवाळा सुसह्य होऊ शकतो.झाडे पण अगदी असंच करतात.अर्थात त्यासाठी त्यांना ब्लूबेरी फळ किंवा सालमन मासा खावा लागत नाही.त्यासाठी त्यांना फक्त सूर्याकडून ऊर्जा घ्यावी लागते आणि त्यापासून साखर व इतर गोष्टी बनवून ठेवाव्या लागतात.

अस्वलासारखेच ते आपल्या सालाखाली याचा साठा करतात.पण ते लठ्ठ होत नाहीत,मात्र त्यांच्या हाडांची,म्हणजे लाकडाची वाढ होते.तयार झालेले अन्न आपल्या ऊतींमध्ये साठवलं जातं.अस्वल जे मिळेल ते खात सुटतं,पण झाडांना मात्र एका मर्यादेपर्यंतच अन्न घेता येतं.

द हिडन लाईफ ऑफ ट्रीज

पी ट र वो ह्ल ले बे न

अनुवाद - गुरुदास नूलकर

अरविंद घनश्याम पाटकर

 मनोविकास प्रकाशन

ऑगस्ट महिन्यानंतर रानटी चेरी,बर्ड चेरी किंवा रानटी सेवा देणाऱ्या झाडांकडे बघून तुम्हाला हे स्पष्ट दिसेल. ऑक्टोबरपूर्वी अनेक दिवस भरपूर ऊन असले तरीही ते आता लाल होण्यास सुरुवात होते.याचा अर्थ आता त्यांचे दुकान वर्षाअखेरीपर्यंत बंद राहणार. सालाखालची जागा आणि मुळं आता अन्नसाठ्याने भरून गेलेली असतात.

अधिक साखर बनवली तर ती साठवण्यासाठी आता जागा नाही.यानंतरच्या काळात अस्वलं जरी खात राहिली तरी झाडांना आता निद्राअवस्थेत नेण्यासाठी सँडमॅन आलेला असतो.

या झाडांव्यतिरिक्त इतर बहुतांश झाडांना अन्नसाठा करण्यासाठी अधिक जागा उपलब्ध असते.त्यामुळे ते प्रकाश संश्लेषण चालू ठेवून बर्फ सुरू होईपर्यंत अन्नसाठा करत राहतात.त्यानंतर मात्र त्यांना सर्व काम बंद ठेवावे लागते.याचं एक कारण म्हणजे पाणी. झाडाचे 'रक्त'च गोठले तर काहीच करता येत नाही आणि परिस्थिती बिकट होऊ लागते.हिमवृष्टी सुरू झाल्यावर जर लाकडात खूप पाणी शिल्लक असेल तर गोठलेल्या नळासारखं ते फुटू शकतं.आणि म्हणूनच अनेक प्रजाती स्वतःच्या लाकडातून आर्द्रता कमी करू लागतात.हे साधारण जुलै महिन्यात सुरू होतं.

पण असं करूनही झाडं हिवाळ्यासाठी तयार झालेली नसतात,त्याला दोन कारणे आहेत.पहिलं कारण म्हणजे,चेरीच्या कुळातली झाडं सोडून इतर प्रजाती उन्हाळ्याचे शेवटचे दिवस ऊर्जा साठवण्यासाठी वापरतात.आणि दुसरं कारण म्हणजे अनेक प्रजातींचं एक काम बाकी असतं,ते म्हणजे ऊर्जेचा साठा पानाकडून खोड आणि मुळांकडे नेऊन ठेवणं.आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे त्यांना अजून आपल्या हिरव्या रंगाच्या क्लोरोफिलचे विभाजन करून ठेवणं बाकी असतं.असं केलं तरच त्यांना येत्या वसंत ऋतूमध्ये नवीन पालवीला क्लोरोफिल वाटप करता येणार असतं. पानातून हिरवा रंगद्रव्य गेला की आधीपासून असलेले पिवळे आणि तपकिरी रंग पानावर चढतात.कॅरोटीनने बनलेले हे रंग बहुतेक संकटात असल्याची घोषणा जाहीर करत असावेत.आता याच सुमारास अफिड आणि इतर कीटक खोडांमध्ये भेगा शोधू लागतात. येणाऱ्या थंडीपासून तिथेच त्यांना सुरक्षा मिळणार असते.सशक्त झाड आपल्या उत्तम तब्येतीची जाहिरात करण्यासाठी उजळ रंगाची पानगळीची पालवी धरतात. अफिड आणि इतर कीटकांना हा संदेश बरोबर समजतो.सशक्त झाडे अधिक विषारी द्रव्य बनवू शकतात ज्यामुळे त्यांच्या पिल्लांना धोका निर्माण होतो. आणि म्हणून हे कीटक आकर्षक न दिसणाऱ्या झाडांच्या शोधात असतात.

पण एवढी उधळपट्टी कशाला करायची? हीच गोष्ट वेगळ्या रितीने हाताळता येते,हे काही सूचीपर्णी झाडे दाखवून देतात.दरवर्षी नवीन पालवी धरण्यापेक्षा ते आपली हिरवी पालवी तशीच ठेवतात.आणि ही सूचीपर्णी पानं थंडीमध्ये गोठू नये यासाठी एक विशिष्ट द्रव्य त्यात सोडलं जातं.तसेच पानातून बाष्पोत्सर्जन रोखण्यासाठी त्यांच्यावर मेणाचा थर चढवला जातो. अधिक सुरक्षा म्हणून पानाची कातडी टणक असते व श्वासोच्छ्वास करणारी छिद्रं खोल खालच्या बाजूला असतात.या सर्व सावधगिरीमुळे झाडातून फार पाणी बाहेर जात नाही.कारण पाण्याचा साठा संपला तर गोठलेल्या जमिनीवरून झाडाला पाणी घेणे शक्य नसते.झाड सुकून जाण्याची भीती असते.

पण सूचीपर्णी पानांपेक्षा रुंदपर्णी झाडाची पानं मऊ आणि नाजूक असतात,म्हणजेच त्यांना स्वसुरक्षा करण्याचं साधन नसतं.म्हणूनच बर्फाची चाहूल लागताच बीच आणि ओक वृक्ष लगेच पानझड करतात. मग या झाडांनी स्वतःच्या उत्क्रांतीत जाड कातडी आणि न गोठण्याची द्रव्यं का बरं तयार केली नसतील? वर्षानुवर्ष लाखो नवीन पानं तयार करून काही महिन्यातच ती झाडून टाकायची,यात फारसा शहाणपणा नाही.परंतु उत्क्रांतीच्या स्पर्धेत हा शहाणपणाच आहे,कारण दहा कोटी वर्षांपूर्वी पानझड वृक्ष पृथ्वीतलावर आले.पण सतरा कोटी वर्षांपासून सूचीपर्णी झाडं इथे आहेत. म्हणजे पानझडी वृक्ष तसे नवीनच. पानं झडून टाकणं हा खरोखरी शहाणपणा आहे कारण यामुळे हिवाळी वादळाच्या तडाख्यात हाडे वाचू शकतात.

ऑक्टोबर महिन्यात मध्य युरोपमध्ये येणाऱ्या या हिमवादळात झाडांना जिवंत राहण्याची कसरतच करावी लागते.ताशी साठ मैल वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यामध्ये मोठी मोठी झाडे उखडून पडतात.आणि काही वर्षे या वेगाचा वारा तर दर आठवड्यालाही येतो. पानझडीच्या काळात होणाऱ्या पावसामुळे जंगलाची जमीन चिखलमय होते आणि झाडांना पुरेसा आधार मिळत नाही.या वाऱ्यामुळे झाडाला सुमारे दोनशेवीस टन वजनाइतका जोरदार धक्का बसतो. ज्या झाडांना स्वतःचा बचाव करता येत नाही, ती वादळात उन्मळून पडून जातात. पण पानझडी वृक्ष मात्र बचाव करू शकतात. त्यासाठी ते आपली सौर ऊर्जा प्रक्रियेची साधनं झडून टाकतात. यामुळे सुमारे बाराशे चौरस यार्ड इतके क्षेत्रफळ झाडवरून नाहीसे होते आणि जंगलाच्या जमिनीवर पडते. हे एखाद्या शिडाच्या जहाजाचे एकशे तीस फूट उंचीचे शीड काढून टाकण्यासारखे आहे.पण इतकंच नव्हे,झाडांचं खोड आणि फांद्या अशा प्रकाराने वाढलेल्या असतात की त्यांच्यामुळे वाऱ्याला कमीत कमी अडथळा होतो.त्यांची रचना एखाद्या आधुनिक मोटार गाडीसारखीच असते. 

त्याउपर,पूर्ण झाड इतकं लवचीक असतं की वाऱ्याचा जोरदार तडाखासुद्धा त्यांना आपल्या शरीरात एकसारखा विभागून सहन करता येतो.अशा सर्व बचावयुक्तींमुळे झाडांना हिवाळ्यामध्ये तग धरता येते.पाच-दहा वर्षांमध्ये एकदा येणाऱ्या प्रचंड मोठ्या चक्रीवादळाला तोंड देताना जंगलातली सर्व झाडे एकमेकांच्या मदतीस उभी राहतात.प्रत्येक झाडाचा बांधा वेगळा असतो.प्रत्येकाच्या लाकडातील तंतू वेगळ्या पद्धतीचे असतात.म्हणजे वाऱ्याचा पहिली झोत आल्यावर प्रत्येक झाड एकाच दिशेला वाकणार असते पण पुन्हा सरळ होण्याचा प्रत्येकाचा वेग वेगळा असतो.पहिला झोत धोक्याचा नसतो.पण वाकडं झालेल्या झाडाला दुसऱ्या झोताचा धोका असतो. सशक्त जंगलामध्ये एका झाडाची दुसऱ्याला मदत होते. एक झाड वाकलेले राहिले तरी त्याच्यामागचे झाड पुन्हा सरळ होण्याच्या मार्गावर असते.यामुळे दोन्ही झाडांचे हलणे कमी होते.वाऱ्याचा पुढचा झोत यायच्या आत जंगलाची हालचाल अगदी संथ झालेली असते आणि पुन्हा वारं आणि झाडं यांच्यातील द्वंद्व चालू होते. झाडांचे डेरे मागेपुढे होताना पाहात बसावसं वाटतं. जंगल एकत्रितपणे मागेपुढे होताना दिसतेच,पण प्रत्येक झाडही हलत असल्याची जाणीव होते.वादळात जंगलामध्ये जाणे धोक्याचे आहे,हे मात्र लक्षात ठेवा.

आपण पुन्हा पानझडी कडे वळू.प्रचंड ऊर्जा खर्च करून दर वर्षी नवीन पालवी बनविण्यातच शहाणपणा आहे, याचा पुरावा म्हणजे प्रत्येक हिवाळ्यानंतर झाड जिवंत दिसते.पण याचे काही वेगळे धोकेही आहेत.हिमवृष्टी हा त्यातला एक धोका.बर्फापासून बचाव करण्यासाठी झाडे आपली पानं झडून टाकतात.मगाशी म्हटल्याप्रमाणे बाराशे चौरस यार्ड पाण्याचा पृष्ठभाग नाहीसा झाला की बहुतांश हिमवृष्टी जमिनीवर पडून जाते,थोडीशीच फांद्यांवर साचून राहते.याचा बर्फ झाला की वजन वाढते.

काही वर्षांपूर्वी पारा शून्य अंशाच्या खाली गेला आणि बर्फाची थोडीशी भुरभुर चालू झाली.असे हवामान तीन दिवस राहिले आणि प्रत्येक तासाला माझी जंगलाबद्दल चिंता वाढत गेली.पावसाची भुरभुर फांद्यांवर पडून त्याचा लगेच बर्फ होतो आणि फांद्यांना काही वेळातच ते वजनदार वाटू लागतं.मात्र हे दृश्य विलोभनीय असतं. सर्व झाडे स्फटिकाने सजवल्यासारखी दिसतात.बर्च वृक्षाची काही तरुण झाडे या वजनाने पार वाकून गेली होती.त्यांची मी आशाच सोडून दिली.आणि प्रौढ वृक्षांमध्ये डग्लस फर आणि पाईन या सूचीपर्णी वृक्षांच्या दोन तृतीयांश फांद्या बर्फाच्या वजनाने मोडून गेल्या होत्या.यामुळे ती झाडं अतिशय.अशक्त झाली होती.त्यांना आपला डेरा पुन्हा वाढविण्यासाठी काही दशकं लागणार होती.पण त्या तरुण वाकलेल्या बर्च झाडांचं मला जरा आश्चर्य वाटतं.

त्यांच्यावरचा बर्फ वितळून गेल्यावर सुमारे ९५ टक्के खोडं परत सरळसोट उभी राहिली.काही अर्थातच पुन्हा जागेवर आले नाहीआणि कालांतराने त्यांचं कुजलेलं खोड मोडून गेलं.आता जंगलाच्या मातीसाठी त्यांचा सेंद्रिय माल होत चालला आहे.

तर मग मध्य युरोपच्या अक्षांशांवर तग धरण्यासाठी पानझड हे एक प्रभावी तंत्र आहे असं म्हटलं पाहिजे. आणि यामुळे झाडांना आपला कचराही झडून टाकता येतो.झोपायच्या आधी आपण जसे स्वच्छतागृहात एक चक्कर मारून येतो,तसेच झाडांनाही झोपण्यापूर्वी नको असलेला कचरा टाकून द्यायचा असतो.

आणि हा कचरा पानझडीमधून जमिनीवर पडतो. पानझड करण्यासाठी ऊर्जा लागते,त्यामुळे ते संपल्याशिवाय झाडाला झोपी जाता येत नाही.एकदा का उपयुक्त द्रव्याचा सगळा साठा पानातून खोडाकडे वळवला की मग जाड ऊतींचा थर बनवून झाड त्या पानाचा फांदीशी असलेला संपर्क बंद करून टाकते. आता वाऱ्याची एक झुळूक जरी आली तरी पान गळून पडतं.सर्व पाने गळून गेली की मगच झाडाला विश्रांती मिळते.त्यांना विश्रांतीची नितांत गरज असते कारण आधीच्या मौसमात त्यांची दमछाक झालेली असते. झोप मिळाली नाही की जसा माणसांना त्रास होतो तसाच झाडांनाही होतो.निद्रानाशापासून जीवाला धोका उद्भवतो.आणि म्हणूनच जर आपण ओक किंवा बीचच्या झाडाला खोलीत वाढवायचा प्रयत्न केला तर ते मरून जातात.इथे त्यांना विश्रांती मिळत नाही आणि वर्षभरातच ते मरू शकतात.

मात्र आपल्या पालकांच्या सावलीत वाढणाऱ्या रोपट्यांची पानझड वेगळ्या प्रकारची असते.त्यांचे पालक जेव्हा पानझड करतात तेव्हा एकदम त्यांच्यापर्यंत भरपूर सूर्यप्रकाश पोचू लागतो.याचा फायदा घेऊन रोपटी ऊर्जा उत्पादनात गुंतून जातात. आणि मग पहिली हिमवृष्टी झाली की चकितच होतात. रात्रीचे तापमान २३ अंश फॅरनहाईटपेक्षा खाली गेले तर मात्र त्यांना जांभया देत निष्क्रिय पडून राहण्याशिवाय इलाज नसतो.आता पानझड करण्यासाठी ऊतींचे थर बनवून त्यांना बिलगून ठेवण्याची वेळ निघून गेलेली असते.आणि असं नाही केल तर पानझड शक्य नसते.ही रोपटी लहान असल्यामुळे त्यांना वाऱ्यापासून आणि बर्फापासून फारसा धोका संभवत नाही.

वसंत ऋतूमध्ये ही रोपटी अशीच अजून एक संधी साधतात.मोठ्या वृक्षांना पालवी फुटायच्या दोन आठवडे आधी त्यांची पालवी फुटते.यामुळेत्यांना भरपूर सूर्यप्रकाश घेता येतो.त्या रोपट्यांना हे कळतं कसं? आपल्या पालकांना पानफुटी कधी होणार याची तारीख काही त्यांना माहीत नसते.त्यांच्या आसपासची जमीन ऊबदार होऊ लागली की ही चाहूल त्यांना लागते. जंगलांतल्या जमिनीवर वसंतातली ऊब आधी पोहोचते. झाडांच्या डेरेदार वरच्या भागापेक्षा दोन आठवडे आधी! त्या उंचीवर दिवसा जोराचे वारे असतात आणि रात्री गारठते. त्यामुळे तिथे ऊब धरायला उशीर होतो.विशाल वृक्षांच्या डेरेदार सुरक्षाकवचामुळे जंगलातल्या जमिनीवर बर्फ कमीच पोहोचतो.त्याच बरोबर जमिनीवर पानगळीचा जाड थर विघटन होत असतो,

 त्यामुळेही जमीन उबदार राहते आणि जमिनीचा पारा वर चढायला मदत मिळते.शरद ऋतूमध्ये रोपट्यांना सूर्यप्रकाशाचा फायदा मिळालेले दिवस बघता,त्या तुलनेत यांना वसंत ऋतू सुरू होण्यावेळी एक पूर्ण महिना मुक्त वाढीसाठी मिळतो.म्हणजे त्यांच्या वाढीच्या काळात २० टक्क्यांची भर पडते.हे काही वाईट नाही ! पानझडी वृक्षांमध्ये काटकसरीने राहण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत.पानझडीच्या आधी बहुतांश प्रजाती पानांमधून ऊर्जा परत फांद्यांत आणून ठेवतात.पण काही प्रजाती याकडे दुर्लक्ष करतात.उदाहरणार्थ, अल्डर वृक्ष उद्याची चिंता न करता स्वतःची हिरवीगर्द पानं झडून टाकतात.पण ही प्रजाती जास्त करून पोषणयुक्त दलदलीच्या प्रदेशात वाढते,त्यामुळे त्यांना दरवर्षी नवीन क्लोरोफिल बनवणे जड नसते.त्यांच्या पायाशी वाढणारी बुरशी आणि सूक्ष्मजीव त्यांच्या पडलेल्या पानांचे विघटन करून झाडाला पोषणद्रव्य उपलब्ध करून देतात.

झाडाला फक्त हे मुळातून घेऊन पुन्हा नवीन क्लोरोफिल बनवायचे असते.नत्रच्या पुनरुज्जीवनाचीही त्यांना काळजी नसते,कारण मुळांवर असलेल्या गुठळ्यांत असणारे सूक्ष्मजीव सतत याचा पुरवठा करीत असतात.दर वर्षी एक चौरस मैलाच्या अल्डर वृक्षाच्या जंगलातून सुमारे ८७ टन नत्र हवेतून घेऊन त्याचा पुरवठा मित्र वृक्षांना केला जातो.बहुतांश शेतकरी जितके नत्र शेतात वापरतात त्यापेक्षा हे जास्त आहे.म्हणजे अनेक प्रजाती काटकसरीने राहतात त्याउलट अल्डर वृक्ष आपल्या संपत्तीचे प्रदर्शन करतात.अ‍ॅश आणि प्रौढ वृक्षही असेच वागतात.हे उधळे आपली हिरवी पानं झडू देतात आणि शरद ऋतूत विविध रंगाने नटणाऱ्या झाडांच्यात त्यांचा नंबर लागत नाही.तर मग स्वभावाने कंजुष असलेली झाडेच रंगबिरंगी असतात,असं दिसतंय.पण हे अर्धसत्य आहे. क्लोरोफिल काढून घेतल्यावर पानांवर पिवळा,केशरी आणि लाल रंग दिसू लागतो.पण हे रंग ज्यामुळे येतात ते कॅरोटिन आणि अ‍ॅन्थोसायनिन सुद्धा काही वेळातच विघटन होऊन बदलणार असतात.ओकचे वृक्ष मात्र अत्यंत सावधपणे सर्व द्रव्य काढून घेतात आणि फक्त तपकिरी पानं झडू देतात.म्हणजेच प्रत्येक झाड वेगळ्या पटीने खर्चीक असते.बीचची पाने तपकिरी आणि पिवळी झाली की झडतात पण आनंदी चेरी झाडांची पानं मात्र लाल असतानाच झडून जातात.

आता शेवटी सूचीपर्णी झाडांकडे वळू.त्यांच्याबद्दल मी फार बोललो नाही पण या गटात पानझडी वृक्षांसारखे पानगळ करणाऱ्या तीन प्रजाती आहेत लार्च,बाल्ड सायप्रस आणि डॉन रेडवूड.हे तिघे पानझडी वृक्षासारखे का वागतात, याची मला खरंच कल्पना नाही.कदाचित असंही असेल की उत्क्रांतीच्या शर्यतीत हिवाळ्यावर मात करण्याचा सर्वोत्तम मार्ग किती सावधगिरीने बाळगावी हे अजून निश्चित झालं नसावं.वसंत ऋतूमध्ये सूचीपर्णी पानं टिकवून ठेवणं हे नक्कीच फायद्याचं असतं.कारण नवीन पान उगवण्याची वाट न पाहता झाडाला आपली अन्नउत्पादनाची क्रिया लगेच चालू करता येते.पण वसंतातल्या उन्हाने अनेक नवीन कोवळे कोंब सुकून जातात जेव्हा मोठ्या झाडांचे वरचे डेरे वसंतातल्या उन्हाने छान गरम झालेले असतात.पण जमीन अजूनही थोडी गारठलेली असते.नवीन कोंब अशा वेळेस प्रकाश संश्लेषण सुरू करण्याची घाई करतात आणि सुकून जातात.त्यांना बाष्पोत्सर्जन थांबविता येत नसल्यामुळे धोक्याची चाहूल लागताच सूचीपर्णी पानं लुळी पडतात. विशेषतःगेल्या वर्षीच्या पानांचे असे होते,कारण त्यांच्यावर मेणाचा जाड थर नसतो.

या तिघांच्या व्यतिरिक्त स्प्रूस,पाईन,फर आणि डग्लस फर ही झाडंसुद्धा आपल्या सुया बदलतात, कारण त्यांना कचरा साफ करायचा असतो.सर्वांत जुन्या सुया ते प्रथम बदलतात कारण इजा होऊन त्यांची कार्यक्षमता कमी झालेली असते. जोपर्यंत ही झाडं सशक्त असतात तोपर्यंत फर दहा वर्षांसाठी, स्प्रूस सहा आणि पाईन तीन वर्षांसाठी आपल्या सूचीपर्णी पानांचा साठा करून ठेवतात.दोन फांद्यामधील वाढ होण्याच्या अंतराकडे पाहून हे लक्षात येते.पण पाईनची झाडं थंडीमध्ये विरळ दिसू लागतात, कारण ते एक चतुर्थांश पानं झडून टाकतात.वसंतात पुन्हा वर्षभर पुरतील इतक्या सुया वाढतात आणि झाडाची वाढ होते.आता मात्र झाड पुन्हा सशक्त दिसू लागते.

●●● समाप्त ●●●




5/23/26

काजवे : अंधारातील प्रकाश / Kajave: Light in the Darkness

नवेगावबांध सरोवराकाठी मी राहात असताना तिथल्या पावसाळी अंधाऱ्या रात्री काजव्यांनी सुशोभित झालेल्या असत.आभाळ सरोवरावर टेकल्यासारखं वाटे. कित्येकदा मी काळोख्या रात्री सरोवरावर काजवे बघायला जाई.नवेगावबांध परिसरात लोक काजव्यांना 'मिलमिले' म्हणतात. काजवा हा शब्द त्यांना माहीत नाही. 'मिलमिले' या शब्दातच काजव्यांचा अर्थ आहे.जिकडं तिकडं किर्र अंधार असे.तो अंधार आकाशातील ढगांमुळं शतपटीनं वाढे.सरोवराकाठच्या झिलाणीतून अनेक कृमि-कीटकांचे आवाज येत.एका सुरात थांबून थांबून बेडकांच्या समूहाचा आवाज येई. बेडकांच्या या सुराला नादमधुर म्हणता येणार नाही; परंतु काळोखाची भीती कमी करणाऱ्या या आवाजाचं मला मोठं आकर्षण वाटे.क्षणभर जरी त्यांचा हा नाद बंद झाला तरी मन अस्वस्थ होई.त्या वेळी माझ्या ध्यानी आलं,की संगीताच्या सप्तसुरांत बेडकांच्या आवाजाला 'धैवत' का म्हटलं आहे. अशा या वातावरणातच बेडकांचा आवाज ( काजवे : अंधारातील सुंदर प्रकाश, पाखरमाया,मारुती चितमपल्ली,प्रकाशक - साहित्य प्रसार केंद्र,सीताबर्डी,नागपूर )ऐकायला हवा.तो अद्भुत नाद असतो.तो अशा अंधारातील मोकळया अवकाशासाठीच असतो.तिथून त्याचा अंतरिक्षात लय होतो.दाटीवाटीनं इमारती असलेल्या शहरात हा अनुभव कधीच येणार नाही.

मधूनच झिंग्यांच्या कळपाचा आवाज येई.एखादा मासा पाण्यातून उंच उडी घेताना त्याची रुपेरी पाठ चमकताना दिसे.नंतर डुबकन आवाज होऊन ती झलक अंधारात गडप होई.सरोवराच्या बांधावर मोहा,बेल,हिरडा,बेहडा आणि आवळ्याची जुनी मोठी झाडं उभी होती.तशीच सरोवराकाठी चिंचेची राई होती.आकाशात सुरुवातीला काही चमकणारे तारे दिसावे,नंतर ते वाढत वाढत साऱ्या नभी दिसू लागावे,तसेच चिंचेच्या घुमटाकार झाडावर किंवा इतर काही वृक्षांवर पहिल्यांदा चार-पाच हिरव्या-पिवळ्या रंगांच्या प्रकाशाचे ठिपके दिसायचे. एखाद्या चांदणीसारखे ते चमकत.

हळूहळू त्या झाडांच्या हिरव्या-काळ्या छतावर प्रकाशाचे अधिक अधिक बिंदू दिसू लागत.थोड्या वेळात ती राई त्या हिरव्या असंख्य बिंदूंनी जणू गोंदवली जायची.

इतके अगणित काजवे एकत्र चमकताना मी यापूर्वी कधी कुठं पाहिले नव्हते.अशा अंधारातदेखील झाडांच्या छताचा मूळ आकार दृगोचर होऊ लागे.सरोवराकाठचं हे गूढ सुंदर रूप मोठं अभूतपूर्व वाटे.दूरवरून पाण्याच्या लहरी किनाऱ्यांवर आंदुळताना कर्णमधुर आवाज करीत,तोही ऐकू येई.

काजव्यांचा एखादा थवा लुकलुकत झिलाणीत स्थिर होई.काही काजवे पाण्यातील पृष्ठावर डोकावणाऱ्या वनस्पतीवर स्वार होत.अशा वेळी प्रकाशाच्या ठिपक्यांचं सुंदर प्रतिबिंब साऱ्या सरोवराकाठच्या जलाशयात दिसू लागे.पुणे-मुंबई शहरांतील विजेच्या दिव्यांची रोशणाई पाहणाऱ्यांना निसर्गसुंदर अशा काजव्यांच्या प्रकाशाच्या शोभेची कल्पना प्रत्यक्षात ती अनुभवल्याशिवाय येणार नाही.

अशा काळोखातील काजव्यांच्या प्रकाशात पाहायला माझे डोळे सरावलेले होते.पाच-सात हुदाळ्यांचं कुटुंब पाण्यात अवतीर्ण झालं,की ते गोल गोल पोहू लागत. मध्येच वळणदार उड्या घेत.त्यांच्या अंगावरही काही काजवे चमकत.झिलाणीत डोकावणाऱ्या पाण्यात काजव्यांच्या प्रकाशाचं प्रतिबिंब पडलेलं दिसे.वर काजवे खाली काजवे असे एक अलौकिक सुंदर दृश्य तिथं जन्माला येई.हुदाळे पाण्यात उड्या घेत,तसे पाण्याच्या तुषारांचा प्रकाश दिसे.मोत्यांसारख्या तुषारांत हिरव्या प्रकाशाचे बिंदू दिसत.मी हे सारं देहभान हरपून तासन् तास अंधारात बसून पाहात शांततेचा एक अवर्णनीय अनुभव घेतला आहे.

आम्ही भारतीय लोक तसे कीटकांच्या जगाविषयी खूप उदासीन वृत्तीचे आहोत.जपानी लोक मात्र या बाबतीत मोठे रसिक आहेत.त्यांची मुलं फुलपाखरं आणि चतुर यांच्याबरोबर खेळतात.रानात टोळ पकडायला एकमेकांना साहाय्य करतात.हिरव्या-जांभळ्या रंगाच्या सोनेरी कीटकांच्या शोधात भटकतात.कीटकांचं संगीत ऐकण्यासाठी जपानी लोक विविध प्रकारचे गाणारे कीटक आपल्या बागेत पाळतात.घरासमोरच्या हौदातील पाणनिवळ्या आणि पाणकीटक न्याहाळण्यासाठी त्यांना वेळ असतो.बागेतील गोगलगाईकडं ते कौतुकानं बघतात,फुलपाखरं,चतुर, रातकिडे,

गाणारे कीटक आणि गोगलगाई यांच्यावर जपानी कवींनी अतिशय आशयघन 'हायकू' रचल्या आहेत.अशा या जपानी देशात एक सुंदर परंपरा आहे. नोबेल पुरस्कार-विजेते याशुनारी कावाबाता यांच्या 'दि लेक' या लघुकांदबरीत काजव्यांच्या उत्सवाविषयी आख्खं एक प्रकरण आहे.ते इतकं भावस्पर्शी आहे,की तुम्ही ते मुळातून वाचल्याशिवाय त्यातील सौंदर्याचा अनुभव घेता येणार नाही.कादंबरीत कीटकांविषयी एक प्रकरण असू शकतं,याचंच मला आश्चर्य वाटतं. कावाबाताच्या सर्वच कथा-कादंबऱ्यांतून जुन्या परंपरेचं जतन करताना जसा त्याआधारे आनंद व्यक्त केला आहे,तशीच त्या आनंदाला दुःखाची भरजरी किनार जोडली आहे.असा हा जीवनाचा सारीपाट कावाबातासारखा समर्थ लेखकच विणू जाणे.इतरत्र मला ते कुठं आढळून आलं नाही.

कादंबरीत तळ्याकाठच्या उंच मनोऱ्यावरून रात्रीच्या अंधारात काजवे हवेत सोडण्याचा आनंद उत्सव आहे. नाना प्रकारचे काजवे छोट्याशा पिंजऱ्यातून विकण्यासाठी तळ्याभोवती दुकानं लागली आहेत. शोभेच्या दारूगोळ्यांची आतशबाजी पाहण्यासाठी जसे जत्रेत आबालवृद्ध जमा होतात,तसेच काजवे हवेत सोडणार,या वार्तेनं पुष्कळ जपानी रसिकांनी त्या तळ्याभोवती जमून गर्दी केली आहे.ते पाहण्यासाठी ते नावेत बसून जलविहार करीत प्रतीक्षा करीत आहेत. बऱ्याच लोकांच्या हातात काजवे धरण्यासाठी जाळी लावलेल्या लांब काठ्या आहेत.

मनोऱ्यावरून काजवे सोडण्याच्या कार्यक्रमाला सुरुवात होताच प्रेक्षकांचा आनंद गगनात मावेनासा होतो. कादंबरीचा नायक गिमपी ते सुंदर दृश्य पाहात आपली प्रेयसी माची हिला शोधीत असतो. ती सुंदर पोशाख करून,तळ्याकाठच्या पुलावर उभी राहून,तो सारा देखावा पाहात त्याची प्रतीक्षा करीत असते.

एकमेकांना हा आनंदानुभव सांगण्यासाठी दोघंही आतुर असतात.हे दृश्य पाहता-पाहता तो हलकेच बालपणीच्या आठवणींच्या जगात पदार्पण करतो.त्याच्या गावतळ्याची त्याला आठवण होते.तिथं अनेक वेळा आईबरोबर काजवे उडताना त्यानं पाहिले होते.इतक्यात प्रेयसी समोर दिसते.तिच्या हातात एक पिंजरा असतो.त्यात काजवे चमकत असतात.युद्धात जखमी झालेल्या आपल्या मित्राला भेट देण्याकरिता तिनं तो घेतलेला असतो.या साऱ्या प्रसंगाची आठवण मनात घोळवीत असताना काजव्यांवर जपानी कवींनी रचलेल्या 'हायकू' मनश्चक्षूपुढं साकार होऊ लागतात.जपानी मुलं काजव्यांविषयीचं प्रेम जन्मतःच घेऊन येत असावीत. वाट चुकलेलं बालक रडत अडखळत अंधाऱ्या रानातून जातं आहे,पण त्याला वाट चुकल्याचं भानदेखील राहिलेलं नाही.त्याही अवस्थेत ते चालताना काजवे पकडू लागतं :

A lost child crying Stumbling over The dark fields.... Catching fireflies

Ryusi

पावसाच्या सुरुवातीला दिसू लागणाऱ्या काजव्यांना पकडण्याचा मोह कोणाला आवरेल? त्यानं बोटाच्या चिमटीत पहिलाच काजवा धरताच तो निसटून गेला. अरे दैवा ! त्याच्या चिमटीत हवा तेवढी राहिली :

The first firefly... But he got away And I... Air in my fingers

Issa

मी त्याला पिंजऱ्यात ठेवण्यासाठी सहज पकडलं,तर त्या काजव्यानं माझी चिमूटच प्रकाशित केली.

As I picked it up To cage it The firefly Lit my finger-tips

निसर्गातील ते अभूतपूर्व दृश्य । खोल नदीच्या अंधाऱ्या प्रवाहात काजवेदेखील मंद गतीनं जात आहेत.पाणी वाहतंय की प्रकाश ?...

Over the deepest Darkest river The fireflies Are flowing slowly

Shiyo

मी त्यांना बोलावतोय. परंतु ते काजवे क्षणभर चमकून अंधारात नाहीसे होतात.

Come come! I Call But the fireflies Flash away Into the darkness

Onitsura

गवताच्या पात्यावर अडखळलेला काजवा पुन्हा उंच उडू लागतो,तेव्हा-

Having tumbled off His grass-blade.. The firefly Buzzes up again

-Basho

काळोखात चमकत असलेला काजवा क्षणभर निघून गेला.तेव्हा जाणवलं,की अंधारातले एकटेपण कसं असतं :

For that brief moment When the firefly Went out... 0 The lonely darkness

-Hokushi

अशीच ही एक अप्रतिम काव्यरचना आहे.तिन्हीसांजा ती तांदूळ धूत होती.तिचं सुहास्य वदन काजव्याच्या प्रकाशात क्षणभर उजळलं (तिला प्रियकराची आठवण झाली होती,की ती तिची सवयच होती?)

As she washes rice, Her smiling face Is briefly Lit by firefly

सोनेरी काजवा,लहान विव्याची ज्योत आणि माणसाचा थंड स्पर्श यांविषयी पहा :

Yellow firefly... Little lamp flame That to the Human touch is chill

-Shiki

शिकाऱ्यापासून दूर उडत जाणाऱ्या काजव्यानं सायंकाळच्या चंद्रप्रकाशात आसरा घेतला :

Fleeing the hunter The firefly Took cover... The evening moon

-Ryota

खाली दिलेली दोन मृत्युगीतं पहा.जीवन किती क्षणभंगुर आहे,आता ते प्रकाशत होतं आणि क्षणातच विझून गेलं काजव्यासारखं :

Suddenly you light And as suddenly Go dark... Fellow-firefly

-Chine-jo

बहिणीच्या हातावर लहान भावाचं तिन्हीसांजा प्राणोत्क्रमण झालं एखाद्या काजव्याप्रमाणं :

Pitiful... on my Outstreched palm At dust dies The tittle firefly

-Kyorai

काजव्यांचं काव्यमय वर्णन करण्यात जपानी कवींनी जी गरुडभरारी मारली आहे,तिथपर्यंत जगातील इतर साहित्यिकांना झेप घेता आलेली नाही.

अगोदर मी काजव्यांच्या काव्यप्रकाशाचा आनंदानुभव घेतला.नंतर त्यांच्या वास्तविक जीवनाकडं जिज्ञासेमुळं वळलो.परंतु असं करताना त्यांच्या जीवनक्रमाबद्दल कौतुकमिश्रित आश्चर्यच वाटलं,काजव्यांना स्वतःचा प्रकाश आहे.मादीच्याशरीररचनेत प्रकाशाच्या ग्रंथी असतात.त्या ग्रंथींचा प्रकाश त्यांच्या विविध जातींप्रमाणं वेगवेगळा असतो.या चमकीमुळं मादीला आपल्या नराची ओळख पटते.वर्षभर क्वचितच दिसणारे काजवे पहिला पाऊस पडताच गवतातून बाहेर पडून लुकलुकू लागतात,तेव्हा नर-मादीचा समागम होतो.काजव्याच्या प्रकाश देणाऱ्या अवयवांच्या पेशींत ल्युसिफेरिन नावाचं द्रव्य असतं. दिव्याच्या ज्योतीचा जसा चटका लागतो,तसं काजव्याच्या प्रकाशाचं होत नाही.कारण त्यात उष्णता नसते.त्याचा प्रकाश थंड असतो.

★★★ समाप्त ★★★

5/21/26

लाटांची टक्कर / Collision of waves

इतिहासातील घटनांचा क्रम महत्त्वाचाच आहे.परंतु त्याच्यापेक्षाही महत्त्वाचे म्हणजे हा दृष्टिकोण घटनांच्या जुन्या क्रमातील खंडांकडे लाणि नव्या उपक्रमांकडेच जास्त लक्ष देतील.त्यामुळे बदल घडवून आणू शकणाऱ्या घटता घडत असतानाच,त्यांची पुरी ओळख पटून,त्यांच्यावर प्रभुत्व मिळविणे आपल्याला शक्य होईल.अगदी साथी सरळ कल्पना अशी,की शेतीचा उदय हा मानवाच्या सामाजिक घडणीतला पहिला,नवे वळण घेणारा असा क्षण होता,आणि नौद्योगिक क्रांती हाही फळी फोडण्याचाच प्रकार होता.यातली कोणतीही घटना ही एकदमच घडलेली दूरवर परिणाम करणारी घटना नव्हती,तर एका विवक्षित वेगाने येणारी बदलाची एकेक लाट होती,अशा तन्हेने त्यांचा विचार होईल.

बदलाच्या पहिल्या लाटेपूर्वी माणसे छोटे छोटे गट करून रहात होती.हे गट स्थानान्तर करीत रहाणारे होते. अन्नाच्या शोधात भटकत,मच्छिमारी करत,शिकारी करत आणि गुरे राखून पोट भरणारे होते.अशा स्थितीत कोणत्यातरी वेळी,सुमारे दहा हजार वर्षापूर्वी शेतीची क्रांतिकारी सुरूवात झाली.गावोगाव,

वस्त्यावस्त्यांत ती हळूहळू पसरत गेली.जमिनी नांगराखाली आल्या. मशागती झाल्या.जीवनाचा नवीनच मार्ग सुरू झाला.

सतराव्या शतकाच्या अखेरीपर्यंत ही पहिली लाट राहिलीच होती.त्यानंतर युरोपात औद्योगिक क्रांतीचा उद्रेक झाला आणि बदलाच्या या दुसऱ्या भल्या थोरल्या लाटेने पृथ्वीवर आक्रमण केले.औद्योगिकीकरणाची ही प्रक्रिया फार मोठ्या वेगाने निरनिराळ्या दिशांमधून, खंडाखंडांमधून पसरत गेली.अशा त-हेने पृथ्वीवर एकाचवेळी पण भिन्न वेगात दोन स्वतंत्र आणि वेगळ्या अशा बदलाच्या प्रक्रिया संचरत होत्या.

आज पहिली लाट पूर्णपणे निमाली आहे.फार थोडया आदिवासी जमाती,उदाः दक्षिण आफ्रिकेतील किंवा न्यू गियानात पापुआतील,केवळ शेतीच्या आधारे जगत आहेत.पण या पहिल्या लाटेचा भर संपूर्णतया ओसरलेला आहे.

युरोप आणि उत्तर अमेरिकेतील,तसेच पृथ्वीच्या इतर काही भागात फार थोड्या शतकांच्या कालावधीत या दुसऱ्या लाटेने जीवनक्रांती घडवून आंणली.अजून तिचा वेग तसाच आहे.पुष्कळ शेतीप्रधान देश पोलाद कारखाने,कापड गिरण्या,वाहन उत्पादक कारखाने, रेल्वे,अन्नावर प्रक्रिया करणारे कारखाने उभारण्याचा प्रयत्न करीत आहेत.औद्योगिकीकरणाचा वेग अजूनही जाणवेल इतका प्रचंड आहे.या दुसऱ्या लाटेचा भर अजूनही संपलेला नाही.पुष्कळ शिल्लक आहे.परंतु अजून ही प्रक्रिया चालू आहे तोवरच याहीपेक्षा खूप महत्त्वाची प्रक्रिया चालू झाली आहे. 

औद्योगिकीकरणाच्या लाटेने दुसन्या महायद्धानंतरच्या काळात सर्वोच्च उंची गाठलेली असतानाच न कळतच तिसरी लाट पृथ्वीनर पसरायला सुरूवात झाली असून जिला तिचा स्पर्श होईल ती प्रत्येक वस्तू बदलत चालली आहे.त्यामुळे पुष्कळ देशातून एकाच वेळी दोन,तीन सुद्धा संपूर्ण वेगळेचा लाटा वेगवेगळ्या वेगात, वेगवेगळ्या ताकदीनिशी आपले अस्तित्य जाणवून देत राहिल्या आहेत.या पुस्तकांत आपण ख्रिस्तपूर्व ८००० वर्ष या काळात पृथ्वीवर सुरु झालेल्या आणि इ. स. १६५०-१७५० पर्यंत अनिर्बंध अधिसत्ता गाजविणाऱ्या पहिल्या लाटेच्या युगाचाही जाता जाता विचार करणार आहोत.या वेळेनंतर पहिल्या लाटेची चलती कमी झाली;आणि दुसऱ्या लाटेचे अपत्य असणाऱ्या औद्योगिक संस्कृतीने पृथ्वीवर ताबा मिळविण्याच्या दृष्टीने गती घेतली;लवकरच तिने कळसही गाठला.

१९५५ च्या सुमाराला सुरू झालेल्या दशकाने ऐतिहासिक महत्त्वाचा ठरणारा परिवर्तन क्षण आलेला पाहिला.या वेळी अमेरिकन संयुक्त संस्थानात पांढरपेशे व नोकरदार यांना प्रथमच श्रमिकांनी मागे टाकलेले.याच दशकात फार मोठ्या प्रमाणात गणकयंत्रे,व्यापारी जेट प्रवास,कुटुंब नियोजनाच्या गोळया आणि अशाच अनेक प्रभावशाली गोष्ठी वापरात आल्या आणि याच दशकात तिसऱ्या लाटेने आपली ताकद एकवटायला सुरूवात केली.त्यानंतर थोडे मागे पुढे असे करत ती इंग्लंड,

फ्रान्स,स्वीडन,जर्मनी,रशिया, जपान,यासह इतरही उद्योगप्रधान देशांमध्ये येऊन पोचला.आणि सध्या तंत्राधष्ठित असे हे सर्व देश तिसऱ्या लाटेच्या आणि दुसऱ्या लाटेच्या कालबाह्य अशा कठीण पण सुस्थित अर्थव्यवस्थेच्या संघर्षांत भरडून निघत आहेत.आणि आपल्या भोवताली जे राजकीय आणि सामाजिक संघर्ष उठत राहिलेले आपण बघतो आहोत,त्याचे खरे मूळ हेच आहे.

आगामी लाटा…

ज्यावेळी एखादी लाट एखाद्या समाजावर प्रभुत्व गाजवताना आढळते त्यावेळी त्या समाजाच्या भविष्यकालीन घडणीच्या धोरणाचा अंदाज करणे तसे सोपेच असते.लेखक,कलाकार,वृत्तपत्रकार आणि इतरांनाही भविष्यकालीन लाटेचा शोध लागतो.अशाच प्रकारे एकोणीसाव्या शतकातील युरोपीय विचारवंत, उद्योगातील अग्रणी,राजकारणी आणि सर्वसामान्य लोक यांना भविष्यकाळाचे मूलतःअचूक अशा चित्राचे आकलन झाले होते.त्यांना यंत्राधिष्ठित शेतीवर उद्योग निर्विवाद असा विजय मिळवणार असल्याची जाणीव झाली होती.आाणि दुसरी लाट भविष्य काळात स्वतःबरोबर आणत असलेले बदलही त्यांना आधीच विलक्षण अचूकतेने उमजले होते.अधिक प्रभावी तंत्रज्ञान,अधिक मोठी शहरे,अधिक गतीची वाहतूक सामुदायिक स्वरूपाचे शिक्षण या व अशाच इतर काही गोष्टींची त्यांना चाहूल लागली होती.

आणि अतिशय स्पष्टपणे झालेल्या भविष्याच्या या दर्शनाचे राजकारणावर प्रत्यक्षच परिणाम झाले.पक्ष आणि राजकीय चळवळी आगामी घटनांची व्यवस्थित चाहूल घेतच आपले कार्यक्रम आखून त्यांची अंमलबजावणी करू लागले.

औद्योगिक क्रांतीच्या अगोदरच्या शेतीप्रधान, संस्कृतीच्या हितसंबंधींनी सर्वदूर जाळे पसरणाऱ्या 'उद्योगा' विरुद्ध,मोठ्या,उद्योगाविरूद्ध,'संघटनांच्या दादा' विरूद्ध आणि,'पापी शहराविरूद्ध पिछाडीकडून' हल्ला होईल अशी व्यवस्था केली.उदयोन्मुख उद्योगप्रधान समाजाच्या मुख्य कळांवर ताबा ठेवण्यासाठी मजूर व व्यवस्थापन झटत राहिले जातीय किंवा वशीय अल्पसंख्यांक औद्योगिक जगाच्या संदर्भात बदललेल्या भूमिकेनुसार आपल्या हक्कांच्या व्याख्या करीत नोकरीतील सवलती,सामुदायिक दर्जा,शहरी निवास, सुधारित वेतन,सामुदायिक लोकशिक्षण इत्यादींबाबत अधिक संधी मागू लागले.या भविष्यकालीन औद्योगिक चित्राचे महत्त्वाचे मानसिक परिणामही आहेतच लोकांचे मतभेद होऊन त्यातून तीव्र आणि काही वेळा तर रक्तपाती संघर्ष देखील निर्माण होत राहिले. 

तेजी,मंदीमुळे लोकांची जीवने उध्वस्त होणेही अशक्य नव्हते.या औद्योगिक भविष्याच्या चित्रामुळे विरोधांच्या मर्यादा स्पष्ट झाल्या.प्रत्येक व्यक्तीला आपण स्वतः कोण आहोत,कसे आहोत आणि पुढे आपले काय होण्याची शक्यता आहे याची देखील समज त्या चित्राने दिली.त्यामुळे समाजात प्रचंड बदल घडत असतानाच व्यक्तीला काही प्रमाणात स्थैर्य आणि अस्मिता मिळत गेली.उलट,ज्या वेळी एखादा समाज दोन किंवा अधिक अशा बदलाच्या भल्या मोठ्या लाटांच्या तडाख्यात सापडतो,आणि त्यातली कोणतीही एक त्यावेळी खास प्रभुत्वही मिळवू शकत नसते,अशा वेळी भविष्याचे चित्र भंग पावते.घडत रहाणारे बदल आणि भडकत रहाणारे संघर्ष यांचे अर्थ लावणेही अतिशय कठीण होत रहाते. ज्यावेळी दोन लाटांची टक्कर होते,तेव्हा सागरात वादळ उठते.प्रवाहांचे संघर्ष होतात,छोटे मोठे भोवरे निर्माण होऊन खळबळ माजते आणि खोलवर असलेल्या खऱ्या ऐतिहासिक महत्त्वाच्या लाटा त्यामुळे लपूनच रहातात.

इतर देशांप्रमाणेच अमेरिकेतही दुसऱ्या आणि तिसऱ्या लाटेची घडणारी टक्कर सामाजिक तणाव,भयानक संघर्ष आणि नवीन काही विचित्रच अशा राजकीय प्रणाली निर्माण करते की ती वर्ग,वंश,लिंग किवा पक्ष यामुळे निर्माण होणारे भेद मानीत नाही;नाहीसेच करते. ही टक्कर नेहमीच्या राजकीय शब्दसमूहात गोंधळ माजवते आणि प्रागतिक व प्रतिगामी,शत्रू व मित्र यांच्यातला भेद जाणणे अशक्य करून टाकते.सर्व जुने मतभेद,विसंगत्या आणि युत्या भंग करून टाकते; संघटना आणि नोकर यांच्यात काही मतभेद असले तरी परिस्थितीशी झुंज देण्यासाठी ते एकी करतात. कृष्णवर्णीय आणि ज्यू एकदा आपल्याला मिळणाऱ्या अन्याय्य वागणुकीविरुद्ध झगडण्यासाठी एकत्र आले आणि नंतर परस्पर विरोधीही झाले.

अनेक देशांमध्ये सर्वसाधारणपणे उत्पन्नाच्या फेरवाटणीसारख्या पुरोगामी धोरणांना पाठिंबा असे. परंतु ते आता अनेकदा स्त्रियांचे हक्क,कुटुंबविषयक नियम,देशाच्या बाहेरून येणाऱ्या स्थलांतरितांबाबतचे नियम,आयातीवरील कर,प्रादेशिकता इत्यादी बाबींचा प्रतिगामी दृष्टिकोणातून विचार करतात.परंपरागत 'डावे' सहसा कडवे देशभक्त व केंद्रसत्तावादी असतात.आपल्या भोवतीच्या सद्यःपरिस्थितीशी त्यांना कर्तव्य असे नसते.आपल्या भोवतीच्या सद्य:परिस्थितीशी त्यांना कर्तव्य असे नसते.त्याच वेळी आपणास जिमी कार्टर किवा जेरी ब्राऊन,व्हॅलेरी जी.ड्इस्टींग यांच्या सारखे राजकारणी लोक आढळतात.त्यांच्या आर्थिक प्रश्नाबाबतचा दृष्टिकोण अगदी 'सनातन' असतो.हेच लोक कला,लैंगिक नीतिमत्ता,स्रियांचे हक्क,निराळया समाजगटांचे ऐहिक किंवा सामाजिक,सांस्कृतिक रचनांच्या संदर्भातले एकमेकांशी असणारे संबंध,अशा गोष्टींबाबत उदार दृष्टिकोण धारण करतात.

त्यामुळेच गोंधळून जाऊन आपल्या जगांचा अर्थ लावू शकत नाहीत.अशातच निरनिराळी वृत्तमाध्यमे निरनिराळे शोध, वेगळया बाबतीतले विरोध,विचित्र घटना,खून, जबरदस्तीने किंवा फसवून कोणाला पळवूनच नेणे, अंतराळातील विक्रम,राजकीय उलथापालथी,गटांनी केलेले हल्ले,अफवा,अशा कित्येक असंबद्ध घटनांबद्दल आपल्याला सांगत असतात.

राजकीय जीवनात स्पष्टपणे दिसून येणाऱ्या विसंगतीचे प्रतिबिंब विस्कळित किंवा खंडित व्यक्तिमत्वातून आपल्याला आढळते.मनोवैज्ञानिक आणि निरनिराळे 'गुरू' या गोष्टीचा चांगलाच फायदा उठवतात.लोक सर्व प्रकारच्या उपचार-पद्धतींकडे धाव घेत,इकडून तिकडे जात रहातात.निरनिराळे पंथ धुंडाळत रहातात किवा गुप्तपणे निरनिराळया तपासण्या करून घेत रहातात. त्यांना सत्य हे हास्यास्पद,विवेकशून्य आणि निरर्थक असल्याचे कळून चुकलेले असते.परंतु यामुळे असे म्हणता येणार नाही,की सध्या घडणाऱ्या घटनांना काही पद्धत किंवा रीतच नाही.खरे पहाता,आपल्याला जर विरत चालल्या दुसऱ्या लाटेशी संबंधित असणाऱ्या बदलांहून वेगळे असे तिसऱ्या लाटेशी संबधित असलेले बदल ओळखता येऊ लागले तर ह्या सर्व घटनांमाग लपून असलेले परंतु स्पष्टपणे अस्तित्वात असलेले सूत्र असल्याचे आपल्या ध्यानात येईल.

या दोन लाटांच्या टकरीतून निर्माण झालेल्या संघर्षाचे आकलन आपल्याला या बदलत्या स्वरूपाचे अधिक स्पष्टचित्र तर दाखवतेच,शिवाय राजकीय आणि सामाजिक शक्ती आपल्यावर करीत असलेल्या 'कार्या’च्या देखील क्षकिरण सदृश सखोल व स्वच्छ प्रतिमा आपल्यापुढे सादर करते.शिवाय ते इतिहासात असणाऱ्या आपल्या स्वतःच्या वैयक्तिक भूमिकेबाबतच्या अंतरंगाचे यथार्थ ज्ञानही देते.कारण आपण प्रत्येकजण वरवर जरी कमी महत्त्वाचे भासलो, तरी प्रत्यक्षात इतिहासाचे जिते जागते अंश,घटक आहोत ! लाटांच्या बदलातून निर्माण झालेले अंतःप्रवाह आपल्याला आपल्या कामां-मधून आपल्या,कौटुंबिक जीवनातून,

आपल्या लैंगिक बाबींबद्दलच्या दृष्टिकोणांतून,आपल्या स्वतःच्या नीतिमत्तेतून प्रतिबिंबित होत असतात.आपल्या जीवन पध्दतीतून आणि राजकीय कृतींमध्ये श्रीमंत राष्ट्रातील आपल्यापैकी बहुतेकजण मरू घातलेल्या दुसऱ्या लाटेचे पाईक तरी असतात;आमूलाग्र भिन्न असणाऱ्या 'उद्याच्या' तिसऱ्या लाटेला वाहून घेणारे तरी असतात, किंवा स्वत्व नाहीसे करुन टाकणाऱ्या,या दोन्हींच्या मिश्रणाची निर्मिती तरी असतात !

सोनेरी किडे आणि छुपे मारेकरी..

दुसऱ्या आणि तिसऱ्या लाटेच्या गटांमधील संघर्ष,खरे पहाता मध्यवर्ती राजकीय तणाव आपल्या समाजाचे तुकडे करत आहेत.आजचे राजकीय पक्ष किवा त्यांचे उमेदवार आपल्याला काहीही पढवत असले,तरी आपल्या कोसळत्या औद्योगिक प्रणालीतील जे काही शिल्लक आहे,त्याचे जास्तीत जास्त फायदे उठविण्याच्या वादाहूनही थोड्या अधिकच,त्यांच्यातील अंतर्गत झुंजी चितनीय आहेत.हेच दुसऱ्या तऱ्हेने म्हणावयाचे झाले तर असे म्हणता येईल,की बुडत्या टिटॅनिकच्या प्रसिध्द डेक खुर्ध्या पटकावण्यासाठी ते हमरीतुमरीवर आलेले आहेत.

आपल्याला असे आढळून येईल,की औद्योगिक समाजाचे अखेरचे दिवस कोणाच्या सत्तेखाली जाणार आहेत या गोष्टीपेक्षा,रिकामी होणारी जागा घेऊ पहाणाऱ्या झपाट्याने उभारणाऱ्या नव्या संस्कृतीला कोण आकार देणार हा प्रश्न फार महत्त्वाचा आहे. आपली सारी शक्ती आणि लक्ष अल्पकालीन राजकीय चकमकींवरच खचून जात असतानाच,एक फार गंभीर स्वरुपाची लढाई या सर्व पृष्ठभागाखाली चालू आहे. तीत एका बाजूला औद्योगिक गतकालाचे पाठीराखे असून,दुसऱ्या बाजूला ज्यांना जगाचे तातडीने सोडवण्याजोगे प्रश्न,अन्न,ऊर्जा,

शस्त्रांचे नियंत्रण, लोकसंख्या,गरीबी,भौगोलिक नैसर्गिक संपत्ती,वर्गभेद, हवामान,वृध्दांचे प्रश्न,नागरी समाजाचे विदारण, उत्पादक व फलदायी कार्याची गरज औद्योगिक रचनेच्या चौकटीत सोडवता येणे आता शक्य नाही हे समजते,असे लोक आहेत.हा संघर्ष उद्याचा महान संघर्ष असणार आहे.प्रत्येक देशांच्या राजकीय जीवनातून दुसऱ्या लाटेच्या फुसक्या हितसंबंधीयात आणि तिसऱ्या लाटेच्या अनुयायात घडणाऱ्या या टक्करीच्या लहरी एखाद्या विद्युत् प्रवाहाप्रमाणे संचारत आहेत.

जगात जे देश औद्योगिक म्हणून गणले जात नाहीत त्या देशांतून या तिसऱ्या लाटेच्या आगमनानिशी पूर्वीच्या जुन्या झगड्यांचा बळेबळेच पुनर्जन्म घडलेला आहे.सहसा सरंजामशाहीशी संबंधित असलेला शेतीविषयक पुरातन लढा,'उद्योगा' च्या बळावर श्रेष्ठ ठरलेल्या 'उच्च' लोकांविरुध्द असणारे विचार-प्रवाह व ते धारण करणारे लोक-भांडवलदार किंवा समाजवादी,

औद्योगिकीकरणाच्या आगामी विलयाच्या संदर्भात एक वेगळाच आकार धारण करत आहे.आता तिस-या लाटेची संस्कृती अस्तित्वात येते आहे अशावेळी झपाट्याचे औद्योगिकीकरण नववसाहत - वादापासून किंवा गरीबीपासून सुटका करु शकणार आहे का ? किंवा त्याच्यावर कायम अवलंबून रहाता यावे अशी हमी देऊ शकणार आहे का ?

केवळ यांच विस्तृत पार्श्वभूमीवर आपणास मथळयांचा अर्थ लागू शकणार आहे.आपल्या जीवनात घडून येणाऱ्या बदलाच्या संयोजनाबाबतची उचित धोरणे आखणे आता शक्य होणार आहे.

हे मी लिहीत आहे अशावेळी वृत्तपत्रांच्या पहिल्या पानांवर इराणमधील उद्रेक व ओलीस प्रकरणे,दक्षिण कोरियातील कत्तली,

सोन्याचे वेगवान सट्टे,काळे लोक व ज्यू यांच्यात अमेरिकेत उडत असलेल्या चकमकी, पश्चिम जर्मनीने संरक्षण खर्चात केलेली मोठी वाढ लाँग आयलंडमधील जळिते,मेक्सिकोच्या आखातातील तेलाचा प्रचंड भडका,इतिहासात सर्वात मोठी ठरणारा अण्वस्त्रविरोधी मेळावा,रेडिओलहरीच्या ताब्याविषयी श्रीमंत व गरीब राष्ट्रात चालू असलेला लढा,अशा गोष्टींचे वृत्तांत आलेले आहेत,लिबिया,सीरिया आणि अमेरिका या देशांमध्ये धार्मिक पुनरुज्जीवनाच्या लाटा धडाक्याने उठत आहेत.नवफॅसिस्ट कल्पना पॅरिसच्या राजकीय 'कत्तली' चे 'श्रेय' स्वतःकडे घेत आहेत.आणि विजेवर चालणाऱ्या स्वयंप्रेरकांना आवश्यक असणाऱ्या तंत्रात मारलेल्या मुसंडीचा अहवाल 'जनरल मोटर्स' ने दिलेला आहेच.अशा तऱ्हेच्या तऱ्हतऱ्हेने विसंगत असणाऱ्या बातम्यांचे तुकडे एकात्मतेसाठी आणि संयोगासाठी टाहो फोडत आहेत.औद्योगिकीकरणाच्या रक्षणास सिध्द असलेले आणि त्याच्या जागी दुसन्या कशाची तरी स्थापना करण्यास उत्सुक असलेले यांच्यामध्ये भडकलेल्या तीव्र लढ्याची आपल्याला कल्पना आली म्हणजे जग जाणण्याची नवी गुरुकिल्लीच आपल्याला प्राप्त झाली,असे म्हणावे लागेल.याहून महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण एखाद्या राष्ट्राची धोरणे आखत असू,किंवा मोठ्या संस्थांची धोरणे ठरवत असू,किंवा आपल्या स्वतःच्या जीवनाची ध्येये पक्की करत असू;आपल्याला जुने जग बदलून टाकणारे नवे साधन मिळाले आहे.या हत्याराचा वापर करण्यासाठी,आपल्याला जुन्या औद्योगिक संस्कृतीकडे झुकणारे बदल,आणि नव्या संस्कृतीच्या आगमनाचा गौरव ठरणारे बदल यांच्यात असणारा फरक ओळखता यायला हवा.

थोडक्यात,आपल्याला दोन्ही जुनी व नवी-जिच्यात आपण जन्म घेतला ती औद्योगिक रचना असणारी दुसरी व आपण व आपली मुले जिच्यात वास करणार आहोत ती तिसरी संस्कृतीही समजायला हवी.

या पुढील प्रकरणात तिसरीच्या उद्भवाची पूर्वतयारी म्हणून आपण बदलाच्या पहिल्या दोन लाटांचे सूक्ष्म अवलोकन करणार आहोत.आपल्याला असे आढळून येईल की,दुसरी लाट संस्कृती ही अनेक घटकांची आपाततःघडून आलेली मिसळ नसून एकमेकांबर,एका अर्थी सूचक,परिणाम करणाऱ्या विभागांची ती एक निश्चित प्रणाली होती आणि औद्योगिक जीवनाचे मूलभूत नमुने देशादेशांतूत तेच एकसारखेच होते;मग या देशांचे सांस्कृतिक वारसे कोणते का असेनात,आणि त्यातील राजकीय मतभेद कसे का असेनात.आणि आजचे 'डावे' व 'उजवे' दोन्ही प्रकारचे 'प्रतिगामी' ह्याच संस्कृतीच्या रक्षणासाठी झगडून राहिले आहेत.आणि याच वेळी सांस्कृतिक बदलाच्या इतिहासातील तिसऱ्या लाटेने हेच जग बदलून टाकण्याचा इशारा दिलेला आहे. 

पहिले प्रकरण संपले…!!