तीनशे वर्षापूर्वी - पन्नास वर्षे आगे मागे म्हणा हवे तर एक स्फोट झाला आणि त्याने साऱ्या भूतलावर आघात करणाऱ्या जबरदस्त धक्कादायक लाटा इतस्ततः झुगारल्या,आणि जुन्या समाजसंस्था मोडूनतोडून एक पूर्णतः नवीन संस्कृती घडवली.अर्थात हा स्फोट म्हणजे औद्योगिक क्रांती.त्याने साऱ्या जगात उठविलेल्या लाटा राक्षसी ताकदीच्या असून त्यांनी पूर्वीच्या प्रचलित असलेल्या सर्व संस्थांवर धडक मारली. ह्या 'दुसऱ्या लाटेने' लाखो लोकांचा जीवनक्रमच बदलून टाकला.
पहिल्या लाटेची संस्कृती जेव्हा अधिकारारूढ होती,त्या हजारो वर्षे व्यापणाऱ्या प्रदीर्घ कालखंडात पृथ्वीवर अस्तित्वात असलेल्या लोकांचे दोन प्रकारात विभाजन करता येत होते:अतिशय प्राचीन काळच्या मानवाच्या धाटणीतच राहिलेला मागास,आदिमानव,आदिवासी हा एक प्रकार,आणि दुसरा प्रकार म्हणजे 'सुसंस्कृत' 'नागर मानव.तथाकथित आदिवासी छोटे गट बनवून किवा टोळया तयार करून एकत्र येणे,शिकार करणे, मासेमारी करणे यातच गुंतून राहिले आणि म्हणून शेतीने केलेल्या क्रांतीने त्याला मागे टाकले.
या उलट 'सुसंस्कृत' जग म्हणजे मुख्यतःपृथ्वीच्या ज्या भागावर लोकांनी जमिनीवर मशागत करणे स्वीकारले, तो भाग होय.कारण जेथे शेती अस्तित्वात येऊन तिचा विकास झाला,त्या ठिकाणी संस्कृतीने मूळ धरले.चीन व भारत यांपासून बेनिन व मेक्सिको, ग्रीस व रोममध्ये संस्कृती उदयाला आल्या,आणि कोसळल्या.झगडे होत राहिले,वितळून जाऊन सांधे जुळलेही आणि असे घडत घडत वेगळेच आकर्षक मिश्रण निर्माण होत राहिले.
तथापि,त्यांच्या वैविध्यामागे,विरोधामागे मूलभूत साम्येच अस्तित्वात होती त्या सर्वामध्ये,अर्थव्यवस्थेचा पाया 'जमिनीवर आधारलेला होता आणि जीवन खेड्यांभोवतीच गुंफले गेलेले होते.त्या सर्वांमध्ये कामाची,श्रमाची साधी सरळ विमागणी अस्तित्वात होती आणि काही स्पष्ट स्वरुपाच्या जाति आणि वर्ग यांचा उदय झाला.खानदान,पौरोहित्य,योध्ये,दलित, गुलाम किंवा वेठबिगार.त्या सर्वामध्ये फक्त सामर्थ्यवानच श्रेष्ठ ठरत होता,'अधिकारी' होत होता. त्या सर्वांमध्ये मनुष्याच्या जन्मानुसारच त्याचे समाजातील स्थान ठरत होते.त्या सर्वांमध्ये अर्थव्यवस्था विकेंद्रित होती,त्यामुळे प्रत्येक जमात आपणास आवश्यक असणाऱ्या वस्तू निर्माण करत होती.
याला काही अपवाद होतेच इतिहासात काहीच कधी साचे सरळ,ठोकळेबाज असू शकत नाही काही व्यापारी संस्कृतीही अस्तित्वात होत्या.नाविक लोक व्यापारासाठी समुद्र पार करुन जात होते.काही अतिशय केंद्रीभूत अशी राज्ये होती.तेथील राज्यसत्ता प्रचंड पाणीपुरवठा योजना तयार करीत असत.परंतु असे काही फरक असूनही,या विशिष्ट वाटणाऱ्या संस्कृतीचे खास असे मूल्यमापन करुनही आपण असे म्हणू शकतो की पहिल्या लाटेने जी संस्कृती सर्वभर पसरवली ती शेती संस्कृतीच होय.
ह्या संस्कृतीचा प्रभाव असताना कधीकधी भावी घटनांच्या सूचनाही मिळत होत्या ! जुन्या ग्रीस व रोममध्ये अपरिणत अवस्थेतील,मोठ्या प्रमाणात उत्पादन करणारे,काही कारखाने निर्माण झाले होते. इ.स.पूर्व ४०० या काळात एका ग्रीक बेटात तेल (जमिनीतील) उपसून काढले जात होते.
ब्रह्मदेशातही इ.स.१०० या काळात हे शक्य झाले होते.बाबिलोनिया आणि इजिप्त या देशात मोठ्या प्रमाणात नोकरशाह्या फोफावल्या होत्या.आशिया आणि दक्षिण अमेरिकेत मोठी केंद्रे ठरतील अशा अनेक शहराची निर्मितीही झाली होती.तेथे पैसे आणि चलनी स्वरुपातील विनिमयही होत होता.कॅथेपासून कॅलाइसपर्यंत व्यापाराच्या मार्गाची जाळी वाळवंटे समुद्र आणि पर्वतराजी यांतून पसरलेली होती.शिवाय बाल्यावस्थेतील नगरपालिका आणि प्राथमिक अवस्थेतील राष्ट्रेही अस्तित्वात होती.प्राचीन अलेक्झांड्रियामध्ये खरोखरच आश्चर्यकारक ठरेल अशी एक गोष्ट अस्तित्वात होती,तो म्हणजे वाफेच्या इंजिनाचे आदिस्वरुप !
तरी देखील ज्याला दूरान्वयानेही औद्योगिक संस्कृती म्हणता येईल असे काहीही तेव्हा अस्तित्वात नव्हते. ज्यांना भविष्यकाळातील चुणुका म्हणता येतील अशा वरील काही गोष्टी म्हणजे इतिहास काळातील विक्षिप्त घटनाच म्हणावयास हव्यात.त्या देखील वेगळाल्या ठिकाणी आणि वेगवेगळया काळात अशा तुटकपणे विखुरल्या गेल्या असल्याचे ध्यानात येईल.त्या कधीही सुसूत्र पध्दतीत एकत्र आणल्या गेल्या नव्हत्या;त्या तशा आणता आल्याही नसत्या.म्हणून आपण इ. स. १६५०-१७५० पर्यंतच्या जगाला पहिल्या लाटेचे जग म्हणू शकतो.प्राचीनपणाच्या काही अपवादांच्या आणि औद्योगिक भविष्याच्या सूचना देणाऱ्या काही घटनांचा विचार करुनही आपण असे म्हणू शकतो,की शेती संस्कृतीनेच या काळात पृथ्वीवर प्रभुत्व होते, आणि जणू काही ते तसेच कायम रहाणार आहे असा भास तरी होत होता;
आणि अशा या जगात औद्योगिक क्रांतीचा उद्रेक झाला. आणि एक मोठी प्रचंड सांस्कृतिक लाट उसळली. आणि तिने एक विचित्र,समर्थ आणि वेडया ताकदीची अशी प्रतिसंस्कृती निर्माण केली.हा औद्योगिकपणा म्हणजे धुराडी आणि यत्रांची जुळणी यांच्याहून खूप काही अधिक असा होता. मानवी जीवनाच्या प्रत्येक भागाला स्पर्श करुन जाणारी अशी ती एक विविधांगी समाजपध्दती होती,आणि तिने पहिल्या लाटेच्या प्रत्येक वैशिष्ट्यावर हल्लाही चढविलेला होता.तिने डेट्रॉइटच्या बाहेर प्रसिध्द विलो रन ही मोठी फॅक्टरी काढली,परंतु तिने शेतावर ट्रॅक्टरची योजन ही केली,ऑफिसमध्ये टाइपरायटर आणि स्वयंपाक घरात रेफ्रिजरेटर बसविला.तिने दैनिक वृत्तपत्रे निर्माण केली.सिनेमाला जन्म दिला,जमिनी खालून जाणाऱ्या गाड्या व डी सी-३ प्रकारची विमाने दिली, त्रिमिति दिली,बारासुरी संगीत दिले,बाँहोस इमारती दिल्या.बार्सेलोना खुर्ष्या दिल्या,बैठे संप दिले, जीवनसत्वांच्या गोळ्या दिल्या,जीवनमर्यादा वाढवून दिली.मनगटी घड्याळे आणि मतपेट्यांना जागतिक पातळीवरील अस्तित्व दिले.आणि अधिक महत्त्वाची गोष्ट ही की या सर्व गोष्टींना एकमेकींशी जोडून दिले. एखाद्या यंत्राप्रमाणे त्यांचा संयोग केला.आणि त्यायोगे आजवरच्या जगातील सर्वात सामर्थ्यशाली सुसंघटित व्याफक समाजपद्धतीची रचना केली.दुसरी लाट-संस्कृतीची.
हिंसामय' उत्तर
ही दुसरी लाट पसरत पसरत वेगवेगळ्या समाजांना जाऊन भिडत असताना जुन्या लुप्तमान शेती संस्कृतीचे रक्षणकर्ते आणि औद्योगिक भविष्याचे कैवारी यांच्यात दीर्घकाळपर्यंत रक्तरंजित लढा होत गेला.पहिल्या आणि दुसऱ्या लाटेचे पाईक एकमेकांवर तुटून पडत.टकरा घेत असताना मधेच येणारे आदि संस्कृतीचे आदिवासी बाजूला सारले गेले; त्यांचा मोठ्या प्रमाणात नाश झाला.
अमेरिकेत,शेती संस्कृती स्थापून तिचा विस्तार करण्याचे धोरण ठरवून युरोपियनांनी आगमन केले,तेव्हा है विरोध,हया टकरी सुरु झाल्या.एक गोरी निष्ठुर शेतीप्रधान लाट,इंडियन लोकांना नागवत,त्यांच्याकडून ताबा मिळवत शेतांची स्थापना करत,शेतीप्रधान गावं वसवत पुढे पुढे सरकत धडाक्याने पॅसिफिककडे चालली आणि त्याला जाऊन भिडलीही !
परंतु दुसऱ्या लाटेच्या दूतांनी या सुस्थित शेतक-यांची अशीच दशा उडवून दिली.न्यू इंग्लंड आणि मध्य अटलांटिक राज्यात कारखाने आणि शहरे वेगाने आपला पसारा मांडू लागली.एकोणीसाव्या शतकाच्या मध्याच्या सुमाराला ईशान्य भागात मोठ्या वेगात औद्योगिक विभागाची वाढ होत गेली.पिस्तुले,घडयाळे, शेती औजारे कापडनिर्मिती,शिवण यंत्रे आणि इतर वस्तू निर्माण करणारे कारखाने उभे राहिले.देशाचा इतर भाग मात्र अजूनही शेतीच्या आधिपत्याखाली होता.पहिल्या आणि दुसन्या लाटेच्या ताकदींमध्ये आर्थिक आणि सामाजिक तणाव तीव्रतेने वाढत गेले.इतके,की इ. स.१८६१ मध्ये दोघांत सशस्त्र भडके उडाले.
अनेकांना वाटले त्याप्रमाणे यादवी युद्ध गुलामीसारख्या नैतिक विषयावरुन किवा जकातीसारख्या लहान आर्थिक विषयावरून लढले गेले नव्हते.ते एका फार मोठ्या प्रश्नावरुन लढले गेले होते.तो प्रश्न असा होता, की हा नवा श्रीमंत खंड कोणाच्या सत्तेखाली असावा ? शेतक-यांच्या का उद्योजकांच्या ? पहिल्या लाटेच्या? की दुसऱ्या ? त्याच प्रमाणे प्रश्नाचे स्वरुप असेही होते, की भावी अमेरिकन समाज मूलतः शेतीप्रधान असावा की उद्योगप्रधान ? उत्तरेकडील सैन्याच्या विजयानंतर मग साचा निश्चित झाला आणि अमेरिकन संयुक्त संस्थानांचे औद्योगिकीकरण निश्चित झाले.मग त्या वेळे नंतर अर्थकारणात,राजकारणात,सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनात शेतीची पीछेहाट होत गेली आणि उद्योगांची भरभराट होत राहिली.रोरावत येणान्या दुसऱ्या लाटेने पहिलीला ओहोटी दाखवली !
दोन सस्कृतींच्या अशाच चकमकी इतरत्र देखील उठल्या.जपानमध्ये इ.स. १८६८ मध्ये सुरु झालेले मेरजी रेस्टोरेशन म्हणजे जपानी ढंगात लढला गेलेला शेतीमय इतिहास आणि उद्योगमय भविष्य यांच्यातला तोच झगडा होय. इ.स. १८७६ पर्यंत झालेला सरंजामशाहीचा निःपात इ. स. १८७७ मध्ये झालेले सात्सुमा वंशाचे बंड, इ.स १८८९ मध्ये, स्वीकारलेली पाश्चिमात्य ढंगाची रचना,या सर्व गोष्टी म्हणजे पहिल्या आणि दुसऱ्या लाटांच्या संघर्षाची परावर्तनेच होत.जपानने प्राप्त केलेल्या औद्योगिक सत्तेतील अग्रस्थानाच्या दृष्टीने पडलेली ही पहिली पावले म्हणावी लागतील.
रशियात देखील पहिल्या आणि दुसऱ्या लाटेतील संघर्ष उद्भवले.इ.स.१९१७ मध्ये झालेली रशियातील क्रांती म्हणजे अमेरिकन यादवी युद्धाची पुनरावृत्ती.प्रथम वाटले त्याप्रमाणे सुरुवातीला लढा साम्यवादावरुनच झाला.परंतु नंतर मात्र तो औद्योगिकीकरणावरुनच झाला.ज्यावेळी बोल्शेविकांनी वेठबिगारी आणि सरंजामी साम्राज्याचे उरलेसुरले अवशेष निपट्न काढताना शेतीला मागे सारले आणि त्याचवेळी औद्योगिकीकरणाला गती दिली.ते दुसऱ्या लाटेच्या पक्षाचे झाले.एकामागून एका देशात हाच पहिल्या आणि दुसऱ्या लाटेच्या पक्षपात्यांमधका झगडा फुटत राहिला आणि त्यामुळेच राजकीय पेच व उलथापालथी, संप,उठान,लष्करी क्रांत्या आणि लढाया निर्माण होत राहिल्या
आज उत्तर गोलार्धात पंचविसाव्या आणि पासष्ठाव्या अक्षांशांच्या दरम्यान औद्यौगिक पट्ट्याने पृथ्त्री वेढली आहे उत्तर अमेरिकेत सुमारे २५० दशलक्ष लोक उद्योग प्रधान जीवनपद्धती अवलंबीत आहेत.पश्चिम युरोपात,स्कैंडिनेव्हिया ते दक्षिणेकडील इटलीपर्यंत, आणखी अब्जावधी लोकांनी हीच जीवनपद्धती अंगिकारली आहे.याच्या पूर्वेला युरेशियन प्रदेश म्हणजे युरोपाचा पूर्व भाग आणि रशियाचा पश्चिम भाग आहे आणि या प्रदेशातही तेवढेच लोक उद्योगप्रधान समाजाचा भाग बनून जगत आहेत,असे आपल्याला आढळून येईल.आणि शेवटी आपण आशियाच्या औद्योगिक भागात येऊन ठेपतो.जपान,हाँगकाँग, सिंगापूर,तैवान,ऑस्ट्रेलिया, न्यू झिलंड आणि दक्षिण कोरियाचे तसेच चीनचे काही भाग याच्या आवाक्यात येतात.येथेही अब्जावधी लोकांनी 'उद्योगा'चा आसरा घेतलेला आपल्याला आढळून येईल.एकूण,जगातील सुमारे एक चतुर्थाग लोकांना औद्योगिक संस्कृतीने अंकित केलेले आहे. (या विभागात सर्वसाधारणपणे मेक्सिकोमधील मेक्सिको सिटी,भारतातील मुंबई अशा आणखीही बऱ्याच ठिकाणांचा अंतर्भाव करता येईल)
भाषा, संस्कृति, इतिहास, राजकारण यांचे तीव्र भेद असूनही हे भेद इतके तीव्र आहेत,की त्या बाबींवरुनच युद्धे खेळलो गेली आहेत.ह्या सर्व,दुसऱ्या लाटेने प्रभावित केलेल्या समाजाची काही समान अंगेही आहेत.खरेच,या सर्व प्रख्यात भेदांच्या मागे गुप्तरुपाने साम्याचे तळ ठाण मांडून आहत.
आणि आजच्या टक्कर घेणा-या बदलाच्या लाटा समजण्यासाठी आपल्याला सर्व उद्योगप्रधान देशातील समाजरचनांची ओळख पटणे आवश्यक आहे.कारण दुसऱ्या लाटेच्या संस्कृतीचा हाच अव्यक्त सांगाडा आहे. कारण खुद्द हीच ओद्योगिक चौकट आता हादरत आहे !
सजीव विजेत्र्या
कोणत्याही संस्कृतीची पूर्वपीठिका म्हणजे उत्साह, शक्ती ही असते.मग तो संस्कृती जुनी असो की नवी.पहिली लाट-समाज आपली शक्ती सजीव विजेऱ्यांकडून मिळवीत असत-मानवी किंवा प्राण्यांच्या स्नायु बळांपासून,किंवा सूर्य,वारा आणि पाणी यांच्या पासूनही मिळवत असत.अन्न शिजवण्यासाठी आणि उष्णता निर्माण करण्यासाठी जंगले तोडली जात,पाणचक्यांनी (यातील काही भरतीच्या लाटांमुळे चाललेल्या ) गिरण्यांच्या तळया चालवल्या,तसेच शेतांमध्ये पवनचक्या करकरू लागल्या.प्राण्यांनी नांगर ओढले. फ्रेंच राज्यक्रांतीपर्यंतच्या काळात,युरोप आपणाला हवी असलेली शक्ती सुमारे १४ दशलक्ष घोडे व सुमारे २४ दशलक्ष बैल यांच्यापासून मिळवत होता, असे अनुमान आहे.याप्रमाणे सर्व पहिली लाट संस्कृतीच्या समाजांनी नूतनीकरण करता येण्याजोग्या शक्ति उगमांचा पुरेपूर वापर करुन घेतला.या लोकांनी तोडलेली जंगले निसर्ग पुनः उगवू शकत होता.शिडे भरणारे वारे भरून निघत होते.चाके फिरवणारे पाणी नद्यांमध्ये पुनः येत होते फार कशाला,शक्ती पुरवणारे गुलाम मानव आणि प्राणी या दोन्ही प्रकारचे देखील जागा मोकळी राहू देत नव्हते!
या उलट दुसऱ्या लाटेचा अंगिकार करणाऱ्या सर्व समाजांनी आपणाला हवी असणारी ऊर्जा,कोळसा,
वायु,तेल या पुनः भरून काढता न येणाऱ्या खडकजन्य इंधनाचा वापर करून मिळवायला सुरुवात केली.हा क्रांतिकारक बदल इ.स. १७१२ मुध्ये न्यू कोमेन याने अति उपयुक्त वाफेच्या इंजिनाचा शोध लावल्यानंतर घडला.आणि याचा अर्थ असा झाला,की निसर्गसंपत्तीने पुरविलेल्या भांडवलावरील व्याज वापरण्याचे सोडून या संस्कृतीने खुद्द भांडवलाचाव घास घ्यायला सुरुवात केली.पण अशा तन्हेने पृथ्वीच्या पोटात दडलेले ऊर्जासाठे खणणे ही गोष्ट औद्योगिक संस्कृतीला मिळालेले मोठेच सहाय्य ठरले आणि त्यामळे तिच्या आर्थिक भरभराटीचा वेग वाढला.आणि मग त्या क्षणानंतर आतापर्यंत जिथे जिथे म्हणून दुसरी लाट जाऊन पोचली तेथील देशांनी उत्तुंग तांत्रिक आणि आर्थिक इमले अशा समजुतीवर उभारले,की ही भूगर्भीय संपत्ती आपल्याला अखंड मिळतच रहाणार आहे.
पूर्वेकडील आणि पश्चिमेकडील समाजवादी, त्याचप्रमाणे भांडवलशाही समाजांकडून हेच धोरण अवलंबिले गेले-विखुरलेली किंवा केंद्रीभूत शक्ती,संपून जाणारी आणि पुनः भरुन येऊ शकणारी शक्ती,अनेक निरनिराळया ठिकाणांतून मिळणारी शक्ती मिळवत रहाणे,वापरत रहाणे.भूगर्भीय ऊर्जा हा दुसन्या लाटेच्या अंमलाखालील सर्व समाजांचा जणू पायाच ठरून गेला.
तंत्रज्ञानाचे उदर
नव्या ऊर्जापद्धतीकडे घेतलेल्या ह्या उडीच्या जोडीनेच तंत्रज्ञानाच्या दिशेने होणारी प्रगतीही फार मोठ्या वेगात व प्रमाणात होत होती.व्हिट्ट व्हिअसने सुमारे दोन हजार वर्षांपूर्वी ज्यांना ' आवश्यक शोध' म्हटले होते, त्यांच्यावर पहिल्या लाटेतील समाजाने भर दिला होता. सुरुवातीच्या काळातील रहाट,तरफ,द्राक्षे गाळण्याची यंत्रे.बेचक्या,कप्प्या,याऱ्या ह्या गोष्टी केवळ मानवाच्या आणि प्राण्यांच्या शक्ती अधिक वाढवण्यासाठीच मुख्यतः वापरण्यात येत होत्या.
दुसऱ्या लाटेने तंत्रज्ञान वेगळ्याच अशा नव्या पातळीवर नेऊन ठेवले.तिने विजेवर चालणाऱ्या,हलणाऱ्या विभागांची,पट्ट्यांची,नळाची,बेरिग्जची,नट,बोल्टें यांची फार मोठ्या प्रमाणात वीण केली.ह्या सर्वांनी आपल्या दातेरी चाकांवर फिरत कडकडाट,गडगडाट उठवणे अव्याहत चालू ठेवले.मानवाच्या किंवा प्राण्याच्या ताकदीला जोड देण्यापेक्षा कितीतरी अधिक कार्य या नव्या यंत्रांनी केले.ह्या ओद्योगिक संस्कृतीने ज्ञानेंद्रिये तयार केली.अधिक अचूकपणे ऐकू शकणारी,पाहू शकणारी,स्पर्श करू शकणारी यंत्रे तयार केली. मनुष्यप्राण्यापेक्षा कितीतरी अचूक आणि निःसंदिग्धपणे ज्ञान प्राप्त करण्याची त्यांची कुवत मोठी आहे.ह्या संस्कृतीने तंत्रज्ञानाला एक असे उदर बहाल केले,की ज्याच्यातून नवीन यंत्रांना जन्म देण्याचा क्रम चालूच ठेवणारी अशी यंत्रे तयार झाली.उदा. यंत्रांचे सुटे भाग तयार करणे इत्यादी.यापेक्षा महत्वाची गोष्ट म्हणजे एकमेकांशी संबंधित,एकमेकांवर अवलंबित अशी एक प्रकारची साखळी तयार करणारी यंत्रे एकाच छपराखाली आणून मोठाले कारखाने या संस्कृतीने उभे केले….!!! तिसरी लाट अलविन टॉफलेर यांच्या Third Wave या पुस्तकाचा अनुवाद शरदिनी मोहिते यांनी केला आहे तर,प्रकाशक महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ पुणे.
हा भाग तीन लेखामध्ये प्रकाशित केला जाईल.