दीर्घायुष्य असलेलं,चिवट सदा हिरवंगार असलेलं, डेरेदार आकाराचं,गर्द छाया देणारं,गावाचं वाऱ्या-वादळापासून संरक्षण करणारं विपुल पानं,फुलं, फळं देणारं,इतकेच नव्हे तर,बगळे,ढोकरी,पाणकावळे, कांबऱ्या ढोक-व्हाईट नेक्ड स्टॉर्क,कंकर व्हाईट आयबिस,अडई,वंडकी इत्यादीपक्ष्यांच्या गूढ घरट्यांना आश्रय देणारं कुठलं झाड असेल तर ते चिंचेचं होय.भारतात नारळाला कल्पवृक्ष तर चिंचेला खजुराचे झाड म्हणतात.
अरबी भाषेत चिंचेला तमार-उल-हिंद म्हणजे 'हिंदुस्तानचे खजुरीचे झाड' म्हणून संबोधले जाते. चिंचेच्या फळांचा रंग देखील खजुराच्या वर्णासारखाच. इंग्रजीत टॅमरिंड ह्या शब्दाचे मूळ जरी अरबी भाषेत असले तरी चिंचेचा उल्लेख अमरकोशासारख्या अतिप्राचीन संस्कृत ग्रंथात आला आहे।तिन्तिडी,चिञ्चाऽम्लिका म्हणजे चिंचेची तीन नावे आहेत.तिन्तिडी,चिंचा व अम्लिका.
भंडारा जिल्ह्यात पस्तीत हजारांवर तळी आहेत.ह्या तलावांच्या प्रदेशात नऊ लाखांवर चिंचेची झाडं आहेत, हे क्वचित कुणाला ठाऊक असेल.जिथं पिकतं तिथं विकत नाही म्हणतात.कुठंही एखाद्या उंच डोंगरावर जाऊन उभे रहा.तुम्हाला दूरवर दिसतील ती चिंचेच्या राईत वसलेली लहान-मोठी गावं.त्यातून डोकावत असलेली मंदिरांची शिखरं.काही ठिकाणी विशाल चिंचेच्या मोठ्या राया आहेत.अगोदर राई वाढली की गाव वसलं,हे सांगणंही कठीण जातं.वाटतं,विविध हिरव्या वर्णांची झाक असलेले जणू ढगच गावाला व्यापून राहिले आहेत.
वृक्षाला कोवळी पालवी फुटू लागली की वाटतं,वैडूर्य मण्यांचे घुमट गावात उभे आहेत.नंतर त्यांचा वर्ण हिरव्या रत्नासारखा दिसू लागतो.चिंचेला एप्रिल-जून महिन्यात फुलं धरू लागतात.त्या फुलांबरोबर दिसू लागतातबगळे-ढोकरी-पाणकावळे यांचे गोदे.ग्रहनक्षत्रांनी निळं आकाश जसं शोभावं तसं पांढऱ्या-बदामी-काळ्या पक्ष्यांनी हे वैडूर्य मण्यांचे घुमट शोभू लागतात ज्ञानेश्वरांनी अशा अद्भुत सारंगागाराचे-हेरॉन्री मोठे मार्मिक वर्णन केले आहे;
अहो आकाशाचिये खोळे। दिसती ग्रहगणाची कुळे।
का महावृक्षी अविसाळे। पक्षिजातीची ।।
बगळे-ढोकरी हे प्रामुख्याने चिंचेच्या झाडावरच का घरटी करतात,हे पक्षिशास्त्रातील कोडं आहे.शेपन्नास झाडांपैकी काही मोजक्या झाडांवरच त्यांची विपुल घरटी का असतात हेही पुन्हा एक गूढ आहे.अशी सारंगागारे नवेगाव राष्ट्रीय उद्यानातील जांभडी व पवनी या नवेगाव तलावाकाठच्या गावात आढळून आली.तसेच इटियाडोहाच्या परिसरातील बोंड गाव व इतर गावांतही दिसून आली.जांभडी येथील सारंगागार नवेगाव राष्ट्रीय उद्यानाचे भूषण आहे,तर त्या गावच्या समृद्धीचे प्रतीक आहे.त्या गूढविस्तीर्ण जलाशयाकडे पाहात राहावं ! सूर्य अस्ताला गेला असला तरी तो स्वयंभू जलाशय कुठल्यातरी अनामिक तेजाने उजाळलेला वाटतो.पाण्यात पडलेल्या हिरव्यानिळ्या पर्वतमालांच्या छाया संधिप्रकाशात मनाला मोह पाडतात.
गूढ रम्य वाटणाऱ्या झीलानी व बोडीतून ढोकरी सारंगागाराकडे थव्याथव्यांनी उडताना,त्यांच्या वाक्-वाक् या स्वराने सायंतन शांततेत नाद-माधुरी ओतीत असतात.पवनी-जांभडी भागातील तलावाकाठचे सौंदर्य अवर्णनीय आहे.हिरव्यागार देवधानांनी रेखांकित असा हा तलावाचा किनारा पुढे जाऊन एका विस्तीर्ण झीलानीत विस्तारला आहे.त्याचा परिसर गूढ बोडींनी व्यापला आहे.ह्या हिरव्यागार पसाऱ्यावर दृष्टी ठरत नाही, इतके ते विशाल आहे.पूर्वेकडील हिरवेगार देवधान व पश्चिमेकडील पर्वतमालांच्या चिमटीत असल्यागत वाटणारा तो जलाशय अशा वेळी सागरातील खाडीसारखा दिसू लागतो.अशा या शांत,अद्भुतसमयी ढोकरी जांभडी गावाकडे रांगेने उंच आकाशातून उडू लागतात.त्यांच्या रांगाचे आकार कधी अर्धत्रिकोणासारखे तर कधी उभी रांग तर कधी आडवी रांग असे दिसतात.ढोकरी हा हा म्हणता नजरेआड होतात.
जांभडी गावच्या त्या चिंचांवर लक्षावधी ढोकरी व बगळे जमतात.ती झाडे या पांढऱ्या व बदामी पाखरांमुळे शोभू लागतात.प्रत्येक घरट्यागणिक असलेली तीन-चार पिले आईबापांच्या आगमनाची चाहूल लागताच विलक्षण कच्-कच् कच्-कच् आवाज करू लागतात. सूर्यास्तानंतर काही काळ ऐकू येणारा त्यांचा कोलाहल हळूहळू दिवेलागणीबरोबर शांत होऊ लागतो.
सकाळी मात्र हे सारंगागार शांत असते.जवळच्या झीलानी व बोडीतून बगळे-ढोकरी पिलांसाठी चारा घेऊन येतात.चारा घेण्यासाठी पिलांची कोण धडपड चालते.नुकतीच आपल्या पायावर उभी राहू शकणारी ती पिले विलक्षण धडपडीने तोल जाऊन खाली तर पडणार नाहीत ना असे वाटते !
सारंगागारे बहुधा गावातील चिंचेच्या झाडावरच असतात.गावात असलेल्या चिंचेच्या झाडांपैकी निवडक वृक्षांवरच ते आपले निवासस्थान बनवून घरटी बांधतात. तेथेच शेकडो वर्षे पिढ्यान्पिढ्या फुलतात,फळतात.पूर्वी गावातून दाट सावली व फळांसाठी चिंचेच्या झाडांची निवड केली जाई.चिंचेच्या फांद्या दाट व लवचिक असतात व पिसाप्रमाणे दिसणारी हिरवी पाने विपुल असतात.त्या घनदाट पालवीतून त्यांची नवजात पिले खाली जमिनीवर पडण्याची शक्यता कमीच. गावाबाहेर रस्त्याच्या कडेने असलेल्या चिंचेवर ते घरटी बांधत नाहीत.कारण तिथे दिवसा कावळे,मोरघारी त्यांची अंडी खातात तर रात्री घुबडे व वटवाघुळांचा त्यांना मोठा उपद्रव होतो. हा त्रास टाळायचा तर गावचा आश्रय घेणेच त्यांना योग्य वाटत असावे.
परंतु तेराव्या शतकात झालेला हंसदेव हा जैनमुनी 'मृगपक्षिशास्त्र' या संस्कृत ग्रंथात याविषयी लिहितो की,'वाघाची डरकाळी नव्हे,तर नुसता हुंकार ऐकूनही बगळे ढोकरी भितात.' त्यामुळे ढोकरी बगळ्यांची घरटी जंगलातील वृक्षावर न आढळता ती गावात किंवा गावानजीकच्या सुरक्षित राईत का दिसून येतात याचे रहस्य समजून येईल.
सकाळी उठून पाहावे तो घराच्या अंगणात-परसात पक्ष्यांची शीट पडलेली दिसते.परसात असलेला भाजीपाला व अंगणातील फुलझाडे ह्या खताने जोमाने वाढतात.तिथल्या जमिनीचा कस कधीच कमी होत नाही.पक्ष्यांची शीट गोळा करून धीवर माशांना घालतात.पक्ष्यांची शीट हे माशांचे आवडते खाद्य आहे. त्यांना तळ्यात खूप मासे मिळतात.ह्या चिंचेवर हे पक्षी राहिले नसते तर रात्री त्यांना हिरवा-निळा-काळा अंधार खायला उठला असता.परंतु ह्या आनंददायी पक्ष्यांनी त्या वृक्षांची तशीच गावची समृद्धी द्विगुणित केली आहे, जंगलातील एकट्यादुकट्या चिंचेवर किंवा रस्त्याच्या दुतर्फा मैल न् मैल असलेल्या चिंचेवरही हे पक्षी घरटी करीत नाहीत याचे आश्चर्य वाटते.ज्या चिंचेच्या राईत गावे वसली आहेत त्यावरच हे पक्षी घरटी बांधतात. चिंचेबद्दल चांगल्या-वाईट लोककथा ऐकण्यात येतात. चैतन्य महाप्रभूना या वृक्षाखालीच बोध प्राप्त झाला व हा चिंचेचा वृक्ष आज वृंदावनात आहे असे सांगतात.तमिळ भाषेत एक म्हण आहे 'भुताशी लग्न झाले तर चिंचेच्या झाडावर चढावे लागते.' चिंचेच्या झाडावर चढणे मोठे कठीण असते.त्याच्या फांद्या काड्या इतक्या विपुल,
घनदाट व चिवट असतात की,त्यातून पक्ष्यांचे शत्रू असलेल्या सापाचादेखील शिरकाव होत नाही. यामुळे त्यांच्या घरट्यांना नैसर्गिक तक्तपोसच मिळतो. अशा सुरक्षित चिंचेच्या कडेकोट किल्ल्यात आश्रयाला राहावयास पक्ष्यांना आवडेलच.(जंगलाचं देणं,मारुती चितमपल्ली, साहित्य प्रसार केंद्र, सीताबाई,नागपूर)
परंतु आपल्या पूर्वजांनी ज्या व्यावहारिक कल्पकतेनं गावची रचना करून चिंचेची झाडे वाढविली ते वैभव आता प्रत्येक गावातून हळूहळू नष्ट होत आहे.पक्ष्यांची शीट घरादारावर पडते,त्याचा घाण वास येतो म्हणून त्या झाडाच्या मोठमोठ्या फांद्या तोडण्यात येत आहेत.परंतु त्यापासून जे फायदे होतात त्या मानानं त्रास काहीच नाही.वाऱ्या-वादळापासून गावाचं रक्षण करणाऱ्या ह्या वृक्षांची तोड अविचारानं चालू आहेच.
निमगावात मी एक भयानक दृश्य पाहिलं.एका धीवरानं तर बगळ्याढोकरीची अंडी टोपलीभर गोळा केली होती.
मी विचारलं,'ह्याचं काय करणार?'
तो म्हणाला,बाजारात ती विकणार.'
हॉटेल-खाणावळीतून ही अंडी कोंबड्यांच्या अंड्यांबरोबर भेसळ करून लबाड व्यापारी ती अन्नात वापरतात.ह्या पक्ष्यांची अंडी आरोग्याला,अतिशय उष्ण व अपायकारक असतात.त्यापासून पोटाच्या अनेक व्याधी होतात.तो धीवर स्वतः पोटदुखीने जर्जर झालेला मी पाहिला.
चिंचेची झाडं भंडारा जिल्ह्यातील कल्पवृक्ष आहेत.चिंचा माघ व फाल्गुन या महिन्यात पिकून तयार होतात.
चिंचा बहुउपयोगी आहेत.चिंचेमध्ये ज्या बिया असतात त्यास चिंचोके म्हणतात.चिंच भाज्या वगैरे बहुतेक पदार्थात घालावी लागते.भातावर घेण्याकरता चिंचेच्या कोवळ्या पाल्याची भाजी करतात,फुलांची चटणी करतात.रेशीम रंगविण्यासाठी चिंचेच्या पानांचा उपयोग होतो.चिंचोके गरीब लोकांचे अन्न आहे.सूत, ताग व लोकरीच्या धाग्यासाठी चिंचोक्यापासून खळ करतात.
त्यांचे उत्तम तेल निघते.तेलाचा उपयोग बाहुल्या व मूर्ती रंगविण्यासाठी करतात.चिंचेचे लाकूड चिवट व टिकावू असते.त्यापासून बैलगाड्यांची चाके व कुऱ्हाडीचे दांडे करतात.तेलाच्या घाणी व उसाचे चरक यांचे बरेच भाग ह्या लाकडाचे बनविलेले असतात. चिंचेच्या रूपानं गावात जणू आरोग्य नांदते.तो नित्य औषधे देणारा वैद्यच वाटतो.मूळव्याध,परमा,पांडूरोग, खोकला,विंचवाचा दंश,क्षतक,शूळ देवीचा आजार, उंदराचे विष,अतिसार,
डोळे येणे,अपचन,भूक कमीहोणे,हिंगुलाचेविष,निवडुंगाचे विष,बैलाचा पाय सुजणे, कानदुखी,अरुची व पित्त,बद्धकोष्ठ,रूईचे विष,भांगेवर उतारा व मोडशी इत्यादी अनेक विकारावर पाने,फुले, चिंचा,
चिंचोके व झाडाची साल वनौषधी म्हणून वापरतात.ही त्यांची बहुमोल उपयुक्तता पाहून राज्य सरकारनं आता चिंचेची झाडं तोडण्यावर बंदी घातली आहे.ती झाडे तोडणं गुन्हा आहे.ज्या चिंचेवर बगळे ढोकरी इत्यादी पक्षी वर्षानुवर्षे घरटी करतात अशी सारंगागारे असलेली झाडं तोडणं तर फारच गंभीर गुन्हा आहे. अशा गुन्हेगारांना दोन हजार रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो.
♀♀♀ समाप्त ♀♀♀