* विजय गायकवाड | Vijay Gaikawad

live

नमस्कार आपले स्वागत आहे. मी पुस्तके आणि मित्रांवर पैसे खर्च करतो,माझ्याकडे दगड आणि विटांवर खर्च करण्यासाठी पैसे नाहीत.- रस्किन बाँड.ही थोर माणसं व त्यांचे विचार मला पुस्तकात भेटलीत.ती भेटली आणि त्यांनी सांगितले कि, प्रत्येक दिवशी असं काही तरी करा की,ते तुम्हाला अधिक सुंदर उद्याच्या दिशेने खूप लांबवर घेऊन जाईल."- डोग फायरबाऊ.' सर्वियन कादंबरीकार मिलोराद पावीच यांचे एक वाक्य आहे ते म्हणतात - जोवर जगात पुस्तक वाचणाऱ्या वाचकांची संख्या बंदूकधारी सैनिका पेक्षा अधिक आहे तोवर काळजीच काहीच कारण नाही.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात.पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये.म्हणून अविरतपणे प्रयत्न करणारे मार्गदर्शक, मित्र धावून येतात.प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,डॉ.दीपक शेटे,आ.भरत बुटाले,प्रा.सर्जेराव राऊत,सुभाष ढगे,अनिल फारणे,डॉ.सुधीर सरवदे ,विश्वास खाडे, विनायक पाटील,संजय कुंभार,सतीश खाडे,मनोहर सुर्वे,गणेश खंदारे,तात्या गाडेकर, दादासाहेब गाडेकर, दादासाहेब ताजणे, पुस्तकातील घटना प्रसंग सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील यांनी केलेले आहे. मला लिहिण्याची प्रेरणा देणारी पुस्तके,लेखक,प्रकाशक,मित्र ही जगावेगळी माणसं माझ्या जीवनातील महत्वाचा टप्पा आहेत.... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ.मेघा गायकवाड, चिरंजीव मयान,माझ्या धावण्यातील गुरुवर्य नामदेव बरुरे,लुल्ला शेख मोठी ताई ,लहान ताई जयश्री शिंदे या सर्वांचेच मनापासून आभार व धन्यवाद मॅट्रिक फेल विजय गायकवाड

6/16/26

नोकोबी लढाया ! Nokobi battles !

रेव्हरंड वेन लेबो दक्षिण यूएसएतल्या कर्मठ धर्मवाद्यांमधलं बडं प्रस्थ.तो स्वतःला 'गिडियनची तलवार' म्हणवून घेत असे; म्हणजे 'कठोर धर्मसंरक्षक'! तो कोणत्याही औपचारिक धर्मपीठाचा रेव्हरंड नव्हता.त्याचं स्वतःचंच एक पीठ होतं.तो मॉन्रोव्हिलच्या तुरुंगात पहारेकरी होता, आणि त्याला खूष ठेवायला बरेच कैदी 'चर्च ऑफ द इटर्नल रिडीमर'चे सभासद होत असत.रॅफचा वार्ताहर मित्र बिल् रॉबिन्स लेबो आणि त्याचे साथीदार यांच्या बाबतीतला जाणकार होता.

"मी विचारतो आहे,मी कितपत काळजी घेऊ, काळजी करू? ते 'पाखंड्यांना येशू मारेल' प्रकरण मला धोकादायक नाही आहे ना?" रॅफनं विचारलं.

"मी ऐकतो आहे,की तुला जे भाषण दिलं लेबोनं,ते इतरांनाही दिलं आहे.प्राध्यापक,शाळांचे हेडमास्तर, काही राजकारणी वगैरे.तू एकटा नाही आहेस ! पण बहुधा ते सगळं त्याच्या साथीदारांसाठी असतं.तो त्यांना दाखवत असतो,'बघा, कसं घाबरवतो या नास्तिक उदारमतवाल्यांना!" बिल् म्हणाला.

"पण मारामाऱ्या करतात का त्याची माणसं ? पोलिसांना सांगून ठेवायला हवं का मी?"

"आहे काही मारठोकीचा इतिहास.काही जण नाहीसेही झाले आहेत.काही खूनही आहेत.पण आज तरी लेबो आणि त्याच्या गँगवर कोणते आरोप नाहीत.आणि सगळ्या घटना इतर चर्चेस, फुटून निघालेले लोक,वगैरेंच्या आहेत. तुझ्यासारख्या बाहेरच्यांचा संबंध नाही."

सत्तास्पर्धा दिसते आहे!" रॅफ म्हणाला.

"असू शकते.सांभाळून राहा. हवं तर पोलिसांना सांग .. आणि.त्यांना सांगितलं आहेस हे लेबोला सांग ! कुणास ठाऊक ? कोणीतरी लेबोला मारायचा प्रयत्न करत असेल!"

पण मध्ये वेगळंच काहीतरी घडलं.जेप्सन लोकांमध्ये नोकोबी जमीन विकण्यावर एकमत झालं!

लवकरच संडरलंड असोसिएट्सनं नोकोबी पट्टा विकतही घेतला,इतर स्पर्धक बिल्डरांना हटवून. आता संडरलंडच्या अधिकाऱ्यांची एक बैठक झाली,पुढे काय करायचं ते ठरवायला.

"काही अडचणी आहेत,पर्यावरणवाल्यांच्या.त्यांना कमी लेखू नका.ते म्हणताहेत की नोकोबीच्या पश्चिमेचा पट्टा जीव-श्रीमंत आहे." रॅफनं सांगितलं.

"म्हणजे नेमकं काय?" एका उपाध्यक्षानं विचारलं. त्याच्याकडे दुर्लक्ष करून रॅफनं आपला अहवाल सुरू ठेवला.

"त्या पट्ट्यातल्या दोन सॅलामँडर्सच्या जाती, एक पक्षी,एक कासव,सगळे धोक्यातले जीव कायद्यानं संरक्षित आहेत.आणि पिचर प्लँटच्या दोन जाती तर जगात इतर कुठेच सापडत नाहीत.त्या 'एंडेमिक' आहेत, प्रदेशनिष्ठ."

आता उपाध्यक्ष भडकला."सॅलामँडर्स आणि पिचर प्लँट्स ! गेलं सालं आपण आखलेलं गोल्फचं मैदान !"

"इतरही आहे." रॅफ शांतपणे म्हणाला."नोकोबीची लाँग लीफ पाईनची झाडं कापायला परवानगी नाही.आपल्याला वाटलं होतं,की ती झाडं सगळ्या भागात भेटतात,त्यामुळे नोकोबीत ती कापायला परवानगी असेल.पण इथली झाडं मूळची आहेत, 'ओल्ड ग्रोथ' म्हणतात तशी.आणि अशी मूळची झाडं देशभरात फक्त दोन टक्के उरली आहेत, म्हणून ती कापण्यावर बंदी आहे.दहा लाख डॉलरचं लाकूड आहे नोकोबीत,पण कापता नाही येत."

यावर उपाध्यक्षांची फौज,खुद्द ड्रेक संडरलंड वगैरेंनी बरीच चडफड केली.सगळ्यांना देवाची अकरावी आज्ञा पाठ होती,की फायदा कमवायला काहीही केलेलं चालतं.आणि विकासातून फायदा होणार होता.माणसं,त्यांचे रोजगार,दरडोई उत्पन्नात वाढ, या साऱ्यांच्या तुलनेत मूठभर जीवजातींचा अग्रक्रम

खालीच मानत होते,सगळे.उपाध्यक्षानं हा सगळा युक्तिवाद मांडला.तोही इतक्या सुसूत्रपणे,की संडरलंडची मानही डोलू लागली.आता उपाध्यक्षानं शेवटचं हत्यार उपसलं.

"ही देवाची इच्छा आहे." तो गंभीरपणे म्हणाला. "तुम्हाला बायबलमध्ये भेटेल ते.त्यानं आपल्याला पृथ्वीचं राज्य दिलं.बसून आ वासून पाहायला नाही, सुबत्ता वाढवायला,वंश वाढवायला."

रॅफला कधीतरी युक्तिवादात देव येणार हे माहीत होतंच."पटतं मला तुझं,रिक्.पण असाही विचार कर,की लोकांना जीवनाचा दर्जा,जीवनाची गुणवत्ता वाढून हवी असते.नोकोबी पश्चिममध्ये उच्च गुणवत्ता आहे,आज.पण आपण धसमुसळेपणा केला तर वृत्तपत्रं हल्ला करतील.तू बिल् रॉबिन्सचे लेख वाचतोस 'रजिस्टर' मधले ? तो दलदली,मूळ वृक्ष,यांच्यावर फार तिखट लिहितो. उद्या इतर संस्था त्याचं ऐकून त्रास द्यायला लागतील,न्यू सिएरा क्लब्,नेचर काँझर्व्हन्सी, लाँग-लीफ अलायन्स,वाट्टेल ते लोक येतील, आपल्याला माहीतही नसलेले."

रिकूनं हात हवेत उडवले,"इथल्या खूप लोकांना शिकार आवडते.मासे पकडायला आवडतं. कोणत्याही वादात त्यांना माणसांचा विचार आधी करायचा असतो.त्यांना राखीव जंगलं आणि जंगल-खात्याचे पहारेकरी आवडत नाहीत.त्यांच्या मते येशू माणसांचे आत्मे वाचवायला पृथ्वीवर आला,किड्यामकोड्यांसाठी नाही."

रॅफचे डोळे विस्फारले. ही सगळी वाक्यं थेट लेबोशी झालेल्या संभाषणातली होती.

ड्रेक संडरलंड अस्वस्थ होता.प्रेस आणि मीडियाचा विरोध त्रासदायक होता,पण मग काय सारी योजना सोडून द्यायची? छ्याः हा सायरसचा भाचा नको ती खुसपटं काढतो आहे !

"ठीक आहे,रॅफ.तुझा काय सल्ला आहे?"

"ड्रेक --" रिक् बोलायला लागताच संडरलंडनं त्याला हातानं थांबवलं.

रॅफनं त्याच्या ब्रीफकेसमधून एक फाईल काढली. "मिस्टर संडरलंड,रिक् -आपण जरा धोरण बदलून प्रश्न सोडवू शकतो.हे सगळे परिसर आणि मरू घातलेल्या जाती वगैरेंना खर्च न मानता नफ्यात धरू शकतो."

त्यानं तीनतीन पानी काही संच काढले,आणि सगळ्यांना एकेक संच दिला.

"पहिल्या पानावर मी महागड्या वृद्ध लोकांसाठीच्या योजनांमध्ये गेली चाळीसेक वर्षे कसेकसे बदल झाले,ते नोंदवलं आहे.त्यातही आपल्या दक्षिण भागातल्या योजना सुट्या दाखवल्या आहेत.फायदेशीरपणा दोन गोष्टींवर ठरताना दिसतो.एक म्हणजे मोठ्या गावांशी जवळीक,आणि दुसरं म्हणजे योजनेभोवतालचा निसर्ग.श्रीमंत म्हाताऱ्यांना गावं जवळ लागतात, आणि त्यापेक्षाही चहूकडे माणसांचा स्पर्श नसलेला निसर्ग लागतो.या दोन गोष्टी दिल्या,तर दर एकरी नफा सगळ्यात जास्त होतो.

"दुसऱ्या पानावर बऱ्याच जमीन व्यवस्थापन आणि रिअल इस्टेट तज्ज्ञांची मतं आहेत.त्यांनाही माणसाचा हात न लागलेल्या जमिनीची जवळीक नफा वाढवतं,असं वाटतं; अगदी एकमत आहे, त्यावर."

"आणि शेवटी मी आपण काय करावं,याबद्दलची माझी योजना मांडली आहे."

रॅफचा योजनेचा गाभा होता,नोकोबीच्या तीरावर मूठभर छोट्या इस्टेटी घडवणं,हा.प्रत्येक घराला तलावापर्यंत जाता येत होतं.सर्व घरांना एक रस्ता जोडत होता,आणि तो चौक्या बसवून पूर्णपणे खाजगी राखला होता.सगळ्या घरांना बोटींसाठी एकच सामायिक धक्का दिला होता.प्रत्येक घराला एकीकडे तलाव आणि दुसरीकडे राखीव जंगल होतं.मध्यमवर्गाला इथे जागा नव्हती,पण श्रीमंतांना श्रीमंती दरानं घरं देऊन कमी खर्चात मूळ अपेक्षित फायदा कमावता येत होता.

"आणि आणखीन एक बाब पाहा.आपण कोणते धोक्यातले परिसर वाचवले,कोणत्या जीवजाती वाचवल्या,याची भरपूर जाहिरात करू शकतो. नोकोबीला प्रसिद्ध करू शकतो.या राज्यात किती विकास कार्यक्रम असल्या कामाचा दावा करू शकतात ? आणि किती जागी घरांमधून पायी जाऊन अशा जाती पाहता येतात ? आपण गव्हर्नरला बोलावू शकतो,उद्घाटनाला ! भरपूर फोटोज् काढल्यानं तोही खूष.आपण जर या योजनेला वनस्पती उद्यान म्हटलं,तर सांभाळेल सरकार,आणि आपल्याला कर कमी करा असं म्हणता येईल!"

('वारुळ पुराण',माधव गाडगीळ',ई.ओ.विल्सन,अनुवाद - नंदा खरे,मनोविकास प्रकाशन )

"आणि मागे त्या मुंग्या मारण्यानं मिळालेली अप-प्रसिद्धीही मिटवून टाकता येईल!"

अखेर कमी कटकटीत मूळ अपेक्षित नफा,या 'अल्टिमेट सेलिंग पॉइंट'वर रॅफचं म्हणणं संडरलंडनं मान्य केलं.उपाध्यक्ष रिक् मात्र दुखावला गेलाच.

शिल्लक भाग पुढील लेखामध्ये..!!

6/14/26

महत्ता भारतीय वादसंवादाची! / The importance of Indian debate!

'माझ्या नसानसांत भारतीयता भिनलेली आहे. भारताविषयीची माझी दृष्टी भाबडी असता कामा नये. कुठल्याही तर्काच्या कसोटीवर माझे विश्लेषण घासूनपुसून पाहता आले पाहिजे,असा माझा कटाक्ष होता.त्यामुळे एखाद्या पाश्चात्त्याच्या तटस्थपणातून मी भारताकडे पाहू शकलो.कठोर टीकाकाराच्या भूमिकेतून मी भारतीय परंपरेची शक्तिस्थळे आणि दुबळेपणा उमजून घेतला होता.म्हणूनच भारताला आधुनिक रूपडे आणण्याची आस मला लागली होती'.-जवाहरलाल नेहरु ( वाद-संवादप्रिय भारतीय - अमर्त्य सेन ( द ऑर्क्युमेंटेटिव्ह इंडियन,पेंग्विन प्रकाशन,अनुवाद : वाद-संवादप्रिय भारतीय - शारदा साठे मेहता पब्लिशिंग हाउस ) डोळ्यांदेखत एक जण दुसऱ्याच्या पोटात सुरा खुपसतो, रक्ताचे थारोळे साचते.अकरा वर्षांचा कुमार हे सारे भेदरून पाहतो आहे.त्याचे वडील भोसकला गेलेल्याला पाणी पाजतात.

रुग्णालयात घेऊन जातात. मात्र,रुग्णालय त्याला वाचवू शकत नाही,हे दृश्य ते बालक जन्मभर विसरू शकत नाही.त्याला 'मारणारा हिंदू,मरणारा मुस्लीम' असा धार्मिक चश्मा मिळाला नव्हता.जात,धर्म,भाषा,प्रांत ह्या क्षुद्र सीमांच्या पलीकडे पाहण्याची गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांची वैश्विक दृष्टी त्याला लाभली होती.मरणारा बेरोजगार होता. माणसाला काम का मिळत नाही? माणूस जिवे मारायला का व कधी तयार होतो? कठोपनिषदात मृत्यूचे रहस्य उलगडण्याकरिता बालक नचिकेत यमाचा पिच्छा पुरवतो,अशी गोष्ट आहे.त्याप्रमाणे 'हा कुमार' हिंसेचा उगम शोधायला निघाला.१९४२ च्या महाभयंकर दुष्काळाच्या आठवणी त्या बालमनाला दुःस्वप्नासारख्या होत्या.गोदामात धान्याच्या पोत्यांची थप्पी असूनही गोदामाबाहेर हाडांचे सापळे का हिंडतात? याचा 'अर्थ'बोध करून घेण्यासाठी अमर्त्य कुमार सेन झटत राहिला.त्यातून दुष्काळाचे व भुकेचे अर्थशास्त्र जगासमोर आले.टागोर यांच्या मानवतावादी विचारांचा विस्तार अमर्त्य सेन यांनी केला.मध्ययुगात रुतलेल्या सुस्त भारताला आधुनिकतेकडे खेचून आणणारा रथ गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी तयार केला.महात्मा गांधी आणि आणि पं.नेहरू यांनी तो रथ ओढणाऱ्या अनेक पिढ्या घडवल्या.

प्राचीन काळापासून पौर्वात्य व पाश्चात्त्य विचार,नवता व परंपरा,निसर्ग व मानव,व्यक्ती व समाज,बुद्धी व भावना अशी अनेक द्वंद्वं चालत आली आहेत.त्यांच्यात अद्वैत साधण्याची किमया टागोर,गांधी व नेहरू यांनी साधली. विक्रम साराभाई,

सत्यजित राय,लॉरी बेकर,अमर्त्य सेन यांसारख्यानी त्यांचा वारसा प्रगल्भ करून आधुनिकता रुजवण्याचे कार्य केले.टिकवून धरावी अशी भारतीय परंपरा कोणती?भारताने नवतेमधील कशाचा स्वीकार करावा? परंपरा आणि आधुनिकता यांचा उत्तम संगम कसा घडवावा? याचा सखोल आणि चिकित्सक मागोवा घेऊन टागोर,गांधी व नेहरू याँनी विचार आणि कृती दिली.त्यासाठी आवश्यक लोकशाही मूल्यांना आधार देणाऱ्या संस्थांची रचना केली.भारतीय लोकशाहीने पंचाहत्तर वर्षांत केलेल्या प्रगतीचा पाया या तिघांनी घातला,याचा विसर पाडणे कृतघ्नपणाचे ठरेल.काळाच्या ओघात कुठलाही बदल घडवण्यात अग्रभागी राहणाऱ्या मध्यमवर्गाची संवेदनशीलता नाहीशी होत गेली.इतरेजनांबद्दल तुच्छता व मग्रुरी हे मध्यमवर्गीयांचे व्यवच्छेदक लक्षण ठरू लागले.पैसा कमावणारा यंत्रवत व आत्ममग्न समाज पाहून १९९१मध्ये सत्यजित राय यांना सुसंस्कृतता (व ते स्वतः) 'आगंतुक' असल्याची

खात्री वाढू लागली.१९९२ मध्ये जर्मनीला विभागणारी बर्लिन भिंत पाडण्यात आली.

जग एकवटण्याची सुरुवात झाली.' त्याच वर्षी तालिबानी काश्मीरमध्ये घुसले आणि हिंसाचार सुरू केला इकडे बाबरी मशीद उद्ध्वस्त झाली.सार्वजनिक जीवनात भौतिक समस्यांपेक्षा धार्मिक व जातीय मुद्द्यांना अधिक महत्त्व येत गेले.अनेक संघटना संपुष्टात येऊ लागल्या.हिंदू-मुस्लीम,सवर्ण-दलित यांच्यात सेतू साधणारे कार्यक्रम दिसेनासे झाले.समाजातील संवाद नाहीसा होऊ लागला.कधीही उद्रेक होऊ शकेल अशी ज्वालाग्राही परिस्थिती अनेक ठिकाणी दिसू लागली.

भारतापुढे भविष्यात काय वाढून ठेवलं आहे? दारिद्र्य व विषमतेच्या पर्यावरणातील अशांतपर्वातून आपण कसे बाहेर पडणार? प्रादेशिक अस्मिता वरचढ ठरून देशाचे तुकडे पडतील?अशा अनकेविध कूटप्रश्नांनी ग्रासलेल्या भारताने विचार कसा करावा? भारतामधील सामाजिक,सांस्कृतिक,राजकीय घडामोडींमुळे अस्वस्थ होऊन अर्थतत्त्वज्ञ डॉ.अमर्त्य सेन भारताच्या भवितव्याबाबत सातत्याने चिंतन करीत आहेत.ते आपल्या व्याख्यानांतून व निबंधांतून त्यांचे विचार आपल्यापर्यंत पोहोचवत असतात. 'द ऑर्क्युमेंटेटिव्ह इंडियन' ह्या ग्रंथातून डॉ.अमर्त्य सेन यांनी भारतीय इतिहास आणि संस्कृतीमधील सार्वकालिक विचारांचे सत्व आपल्याला काढून दिले आहे.स्त्रिया व कष्टकरी चळवळीमधील ज्येष्ठ कार्यकर्त्या श्रीमती शारदा साठे यांनी 'वाद-संवादप्रिय भारतीय' हा या मौलिक ग्रंथाचा अनुवाद, मराठी वाचकांना उपलब्ध करून दिला आहे.अमर्त्य सेन यांनी प्रस्तुत ग्रंथामध्ये 'अभिव्यक्ती आणि बहुविधता','संस्कृती आणि परस्परसंवाद',

'राजकारण आणि निषेध','बुद्धिप्रामाण्य आणि ओळख' अशा चार भागांतील प्रत्येकी चार प्रकरणांमधून सविस्तर व सखोल मांडणी केली आहे.'वाद-संवादातून चातुर्य येते', या सुभाषिताची प्रचिती भारतीय इतिहासात वारंवार येते.वेद- उपनिषदांचा काळ असो वा रामायण-महाभारताचा काळ असो;मंडण व खंडण हा सार्वजनिक जीवनाचा अविभाज्य घटक होता. सार्वजनिक वादविवादांमध्ये जातिभेद वा लिंगभेद नव्हता.प्रत्येकाला मोकळेपणाने विचार मांडण्याची मुभा होती.भारतीय युक्तिवादाची परंपरा ही कोणाचीही मक्तेदारी

( १ 'आगंतुक' हा सत्यजित रे यांचा शेवटचा चित्रपट. १९९२ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात रे यांनी तथाकथित सभ्यता व सुसंस्कृततेला प्रश्न विचारले आहेत.

२ दुसऱ्या महायुद्धानंतर विचारसरणींच्या आधारावर जर्मनीची पूर्व व पश्चिम अशी फाळणी झाली.पश्चिम जर्मनीने लोकशाही भांडवलवादाच्या तत्त्वावर वाटचाल केली,तर पूर्व जर्मनीने साम्यवादी (कम्युनिझम) तत्त्वावर.साम्यवादी सोव्हिएत रशियाचे पतन झाल्यानंतर १९९२ मध्ये जर्मनीचे पुन्हा एकीकरण होऊन तिथे लोकशाही भांडवलवाद रूढ झाला.)

नव्हती.आद्य शंकराचार्यांना विचार करण्यास भाग पाडणारा चांडाळ होता.रामायणात रामावर कडाडून टीका करणारा नाबाली होता.याज्ञवल्क्य ऋषीला विदुषी गार्गी धर्मशाखातील कूटप्रश्न विचारते.

द्रौपदीने केलेल्या प्रश्नांच्या भडिमारापुढे धृतराष्ट्र,

विदुर,भीष्माचार्य दिङ्गुढ होतात.इतकेच काय,जेव्हा रक्तरंजित युद्ध करण्यापेक्षा सत्तेचा त्याग उत्तम असा पर्याय युधिष्ठिर निवडतो, त्या वेळी द्रौपदी म्हणते,'आपण राजाधिराज इंद्राप्रमाणे शूर आहात.अवघ्या पृथ्वीवर आपण प्रदीर्घ काळ राज्य केले आहे.आता आपल्याच हाताने ते राज्य भिरकावून देत आहात.

आपल्याला शौर्य कर्म करावयाचे नसेल,तर क्षत्रियाचे प्रतीक असलेले हे धनुष्य द्या फेकून! केसांची वेणी करून घ्या.मग खुशाल आयुष्यभर पवित्र अग्ग्रीला आहुती देत बसा.' हा द्रौपदीचा युधिष्ठिराशी संवाद केवळ भावनिक नाही.समर्पक उपमा,रूपक यांची पखरण करीत केलेली ती तर्कशुद्ध मांडणी होती.पुढे युद्धभूमीवर कृष्ण व अर्जुन यांच्यातील प्रदीर्घ संवाद गीतेमधून व्यक्त झाला आहे तात्त्विक व नैतिक प्रश्नांमुळे अर्जुन विषण्ण झाला होता.त्याच्या सर्व शंका व संशय नाहीसे करून त्याने युद्धास सिद्ध होईपर्यंत कृष्णाने केलेले तर्कशुद्ध संभाषण गीतेच्या अध्यायांतून आढळते.

'महापुरुष असो वा ग्रंथ;कोणाचेही प्रतिपादन हे अंतिम प्रमाण मानू नका.बुद्धीस पटले तरच त्याचा स्वीकार करा.' हा संदेश हीच भारतीय विचारपरंपरेची अमूल्य देणगी आहे,याचे अनेक दाखले अमर्त्य सेन देतात. प्राचीन भारतात धार्मिक कर्मठपणाला समाजातील कनिष्ठ वर्गांकडून सतत आव्हाने दिली गेली. जातिव्यवस्था घडत गेली,तेव्हा श्रेष्ठत्वाच्या उतरंडीवर घणाघाती हल्ले झाले आहेत.भृगू ऋषी भारद्वाजांना विचारतात,'आपण सारी ईश्वराची लेकरे आहोत,तर मुलांचे वर्ण भिन्न कसे असू शकतील?' यक्ष व कूटप्रश्नांच्या आधारे तर्काच्या कसोटीवर प्रत्येक बाब तपासून पाहणे,शंका व संशय घेणे ही प्राचीन भारतामधील सहज प्रवृत्ती झाली होती. 'बाबा वाक्यं प्रमाणं' मानणाऱ्यांना भारतीय इतिहासात प्रतिष्ठा नव्हती.त्यातूनच चार्वाकांचा नास्तिकतावाद विस्तारत गेला. 'मृगजळाप्रमाणे इंद्रियांस कधी भास होऊ शकतात.धूर असेल तर आग असण्याची शक्यता असते, एवढेच सांगता येते.'असे लोकायत दर्शन सांगते.कनिष्ठ जातींना मिळणारी वागणूक सहन न झाल्यामुळेच बौद्ध व जैन धर्माची स्थापना झाली. त्या काळात वाद-संवादांमुळे मतांतरे व त्यातून धर्मांतरे झाली आहेत.सामाजिक भेदभावाचा धिक्कार करणाऱ्या हिंदू भक्ती पंथ,तसेच मुस्लीम सूफी पंथ यांचा सहज प्रसार मनपरिवर्तनामुळेच झाला होता.सहिष्णुता व सौहार्दाचे वातावरण तयार करण्यात ऐतिहासिक भूमिका बजावणारे सम्राट अशोक,अकबर हे हिंदू नव्हते.विणकर कबीर,चर्मकार रविदास,सेना न्हावी, नरहरी सोनार हे कवी; तर मीराबाई.मुक्ताबाई,दयाबाई, अंदलबाई,

सहजोबाई ह्या कवयित्रींच्या भजनांची समाजमनावर छाप अजूनही आहे. विचारमंथनाची प्रक्रिया खोलवर रूजल्यामुळे समाजातील सर्व थरातून अभिव्यक्तीचा तो अविष्कार होता.इसवी सन १००० सालार्यंत अवघ्या जगावर भारतीय विज्ञान,तत्त्वज्ञान आणि गणित यांचा दबदबा निर्माण झाला होता. त्याचा पाया हा बहुविधतेच्या ऐतिहासिक परंपरेने रचला होता.

वाद-संवाद परंपरांमुळे भारतीय उपखंडातील सामाजिक व सांस्कृतिक जगाची जडणघडण होत गेली.त्यामुळेच बहुविधता हा आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक झाला आहे.भारतीय लोकशाही ही ब्रिटिशांच्या प्रभावाची निष्पत्ती असल्याची ग्वाही अनेक स्वयंघोषित बुद्धिवादी देतात.अतिप्राचीन काळापासून चालत आलेल्या वाद-संवाद परंपरांमुळे आपल्या लोकशाहीची पाळेमुळे खोल रुजली आहेत,हा इतिहास त्यांना माहीत नसतो.

असे नसते तर ब्रिटिश साम्राज्याच्या आधिपत्यापासून मुक्त झालेल्या शंभर राष्ट्रांमध्ये लोकशाही सारखीच दिसली असती,असा बिनतोड युक्तिवाद सेन करतात.

प्राचीन भारतामध्ये कालगणना करण्यासाठी सात प्रकारच्या दिनदर्शिका उपलब्ध होत्या.खगोलशास्त्र व गणिताचा गाढा अभ्यास असल्याशिवाय दिनदर्शिका तयार करता येत नाही.इसवी सन पूर्व ३१०२ मध्ये कलियुग कालगणना पद्धतीचा आरंभ झाला.त्यामधील अचूक गणितीपद्धतीच्या नोंदी पाहून आज कुणीही थक्क होईल.चार लक्ष बत्तीस हजार वर्षांचे कलियुग हे चार युगांतील सर्वांत लहान युग आहे.कृतयुग हे कलियुगाच्या चौपट,द्वापारयुग हे तिप्पट,तर त्रेतायुग हे कलियुगाच्या दुप्पट होते.'कलियुग दिनदर्शिकेमधून त्या काळातील ग्रहताऱ्यांची अचूक स्थिती लक्षात येते',असा गौरव गणितज्ञ लाप्लेस यांनी केला होता.सेन यांनी बुद्धनिर्वाण,महावीरनिर्वाण शक,बंगाली व कोल्लम यांसारख्या इतर दिनदर्शिकांचा अभ्यास करून त्यांच्यामधील विविधता आणि एकतेकडे लक्ष वेधले आहे.

इतिहासाची महत्ता सांगताना सेन वर्तमानातील भारताच्या समस्यांबाबत चिंता व्यक्त करतात. जागरूक मतदारांना धार्मिक अस्मितेपेक्षा भूक, रोजगार, शिक्षण, आरोग्य हेच प्रश्न महत्त्वाचे वाटतात, याकडे ते वाचकांचे लक्ष वेधतात.

इतिहासाची महत्ता सांगतानाच सेन वर्तमानाकडे येतात. केवळ संख्यांचा आधार घेऊन भारताला हिंदुत्ववादी ठरवण्याच्या विकृत खटाटोपाचा खरमरीत समाचार घेतात 'कडव्या हिंदुत्वाचा पुरस्कार करणाऱ्या राजकीय पक्षांना स्वातंत्र्य चळवळीपासून आजतागायत कधीही जनाधार मिळालेला नाही.आजही भारतीय जनता पक्षाला ३० टक्क्यांपेक्षा अधिक मते मिळू शकत नाहीत.बाबरी मशीद उद्ध्वस्त करणे,गुजरातमध्ये मुस्लिमांवर निर्घण अत्याचार करणे,असे हिंसाचार करून धर्माच्या पायावर राजकीय फायदा उठवता येत नाही.जागरूक मतदारांना धार्मिक अस्मितेपेक्षा भूक, रोजगार,शिक्षण,आरोग्य हेच प्रश्न महत्त्वाचे वाटतात,हे अनेक निवडणुकांमधून व्यक्त झाले आहे.हेच भारताचे वैशिष्ट्य आहे.' असे ते म्हणतात.भारत व चीन यांच्यात व्यापारी संबंध पूर्वापार चालत आले आहेत.बौद्ध धर्मामुळे देवाणघेवाण वाढत गेली. पहिल्या सहस्रकात भारतीय विद्यापीठात शिक्षण घेण्यासाठी चिनी विद्वान मोठ्या संख्येने येत असत. चिनी प्रवाशांनी,तसेच विद्वानांनी भारतीय शिक्षण व आरोग्यव्यवस्थेला आदर्श म्हटले आहे.

हा इतिहास रम्य वाटला,तरी वर्तमानात भारताची शिक्षण व आरोग्य क्षेत्रातील अवस्था दयनीय आहे.शिक्षणाचा प्रसार आणि उत्तम सार्वजनिक आरोग्य यांच्यामुळे जागतिकीकरणानंतर चीनला आंतरराष्ट्रीय व्यापारात हनुमान उडी घेता आली.निर्यात होणाऱ्या वस्तूंचे उत्पादन करण्याकरिता चीनमध्ये कामगारांना प्रशिक्षित केले जाते.जागतिक बाजारपेठेत उतरायचे असेल,तर गुणवत्ता उच्च दर्जाची असावी लागते.अनुरूप शिक्षण व चांगले आरोग्य असल्यास उत्पादन व सेवा यांचा दर्जा टिकून राहतो.जागतिक बाजारपेठेत चीनने स्थान मिळवताच तिथे नोकऱ्या वाढू लागल्या.या विकासप्रक्रियेपासून भारताने बोध घेतला पाहिजे,असे आग्रही प्रतिपादन अमर्त्य सेन करतात.

'राजकीय समानता आली,तरी सामजिक व आर्थिक विषमतेमध्ये भारतीय लोकशाही आयुष्य कंठणार आहे.' १९५०मध्ये डॉ.आंबेडकरांनी प्रजासत्ताकावर केलेले मार्मिक भाष्य आजदेखील तंतोतंत लागू पडते. 

१९४३ नंतर दुष्काळामुळे भूकबळी झाले नाहीत,याचे श्रेय भारतीय लोकशाहीला आहे.गेल्या पंचाहत्तर वर्षांत आयुष्यमान व दरडोई उत्पन्न वाढले.तरीदेखील आपल्याला अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. काही महानगरांमधील मोजक्या लोकांभोवती जागतिकीकरणाचा फायदा एकवटला आहे. 'विषम संधी हा आपल्या लोकशाहीवर लागलेला कलंक आहे. निरक्षरता,अनारोग्य,अपूर्ण जमीन सुधारणा व शेतीविकासाची उपेक्षा अशीच चालू राहिली,तर अशांतता व असुरक्षिततेमुळे लोकशाही धोक्यात येऊ शकते.' हे प्रखर वास्तव सेन अधोरेखित करतात. त्याचबरोबर ते उपाययोजनादेखील सुचवतात.प्राथमिक शिक्षणाच्या व्यवस्थापनाची पुनर्रचना करावी, शाळेच्या व्यवस्थापनात वंचित समाजगटाच्या पालकांचा समावेश करावा,अशा अनेक धोरणात्मक सूचना ते करतात.

महाभयंकर हिंसा आणि पर्यावरण विनाश यांमुळे सध्या जग अंधारून गेले आहे.तर्क वा युक्तीने संवाद साधता येण्याची क्षमता नसणारे निर्बुद्ध लोक बळाच्या आधारे मत लादू पाहतात.असे लोक सर्व काळात,सर्व धर्मांत व पंथांत असतात.लोकशाही व समाजस्वास्थ्य धोक्यात येण्याचे प्रसंग राष्ट्राच्या आयुष्यात येत असतात. 

आज समस्त जनता हवालदिल झाली असून,हे भीषण वातावरण त्यांना नकोसे झाले आहे.जनता तिच्या विविध पद्धतीने भावना व्यक्त करीत आहे आणि हीच आशा आहे.बदल व्हावा ही अभिव्यक्ती महत्त्वाची असते.त्यातूनच युक्तिवाद व वाद-संवाद झडू लागतात. मोठ्या परिवर्तनाची ती नांदी असते.काळ्याकुट्ट ढगांनी दाटी केली,तरी काही क्षणांत रुपेरी कड अवतरते आणि आसमंत उजळून जातो.निरंतर सुरू राहिलेल्या वाद-संवाद परंपरेने भारतावरील अनेक सावटे दूर केली आहेत.त्यामुळेच वाद-संवाद परंपरा हीच भारतीयत्वाची ओळख आहे,हे सेन साधार दाखवून देतात.एकविसाव्या शतकातील भारतात १००० पुरुषांमागे ९३० स्त्रिया आहेत.आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने गर्भाचे लिंग जाणून घेतल्यावर मुलींचा नाश करण्याचे प्रमाण वाढत आहे.१९८६ मध्ये जगभरातील १० कोटी बालिकांना 'गायब' करून टाकले गेले.या वास्तवाने सेन दुःखी होतात.पंजाब,

हरियाणा,गुजरात व महाराष्ट्र ही राज्ये त्यात आघाडीवर आहेत.त्यामानाने पूर्व व दक्षिणेकडील राज्यांत परिस्थिती बरी आहे. हा लिंगभेद समाजस्वास्थ्य बिघडवून टाकणारा आहे.मातांचे मोठ्या प्रमाणावर कुपोषण होते.त्यामुळे कमी वजन व आजार घेऊनच बालकांचा जन्म होतो.पुढे बालपणातील कुपोषणामुळे अनेक व्याधी जडतात.यापासून सुटका झाली असेल,तर शिक्षण,नोकरी,व्यवसाय,संशोधन, राजकारण सर्वच क्षेत्रांत स्त्रियांना मिळणाऱ्या सुविधांपासूनच विषमता सुरू होते.

गुणवत्ता असूनही महिलांना संधी नाकारण्याची मानसिकता आजही तेवढीच आक्रमक आहे.त्यामध्ये गरीब व श्रीमंत असा वर्गभेद करता येत नाही.अमेरिकेत दरवर्षी १५ लाख महिलांवर बलात्कार होतात,याकडे सेन लक्ष वेधतात.आपली संस्कृतीची वैशिष्ट्ये कोणती? इतिहास कसा वाचावा? यांचा वस्तुपाठ प्रस्तुत ग्रंथ देतो. भूतकाळाचे भान व वर्तमानासाठी कृतिआराखडा सेन सादर करतात.

समाप्त...



6/12/26

बिबट्यांचा गोतावळा / Leopard dive

बिबट्यांच्या कुटुंबामध्ये सुरुवातीला राजाचा आहार सर्वांत जास्त होता.त्याला साधारणपणे अडीच ते तीन किलो चिकन रोज लागत असे.त्या खालोखाल जेरी, त्यानंतर तारा आणि सर्वांत कमी म्हणजे साधारणपणे दीड किलो चिकन निकी खात असे.दररोज साधारणपणे आठ ते साडेआठ किलो चिकन आम्हाला लागायचं. बिबट्यांना खाऊ घालणं हा स्पेशल इव्हेंट असे. दुकानातून आणलेलं चिकन एका बादलीत घेऊन आम्ही 'लेपर्ड केज'वर जायचो.त्या वेळी चारही बिबटे बहुधा आऊटडोअर सेक्शनमध्ये असत.

इनडोअर सेक्शनमध्ये एकूण चार पिंजरे होते.चिकनचं आमिष दाखवून एकेका बिबट्याला आम्ही एकामागोमाग इनडोअर सेक्शनमध्ये बंदिस्त करत असू.त्यानंतर प्रत्येक बिबट्याला त्याच्या गरजेनुसार जेवण देत असू.प्रत्येक फीडिंग सेक्शनला दोन दारं होती.एक आतलं आणि एक बाहेरचं.बाहेरचं दार कधीतरीच म्हणजे फक्त साफसफाईच्या कामासाठीच उघडलं जात असे.

एकदा मात्र चांगलीच गंमत झाली.मी आणि संपत पुलावळे बिबट्यांच्या फीडिंगला गेलो होतो.खरं तर संपत हा माकडांचा कीपर;पण बिबट्यांचा नेहमीचा कीपर रजेवर असल्याने मी त्याला सोबत घेतलं होतं. राजा,निकी,तारा,जेरी सगळे आपापल्या इनडोअर सेक्शनमध्ये आले.मी सर्वांना रोजच्यासारखं जेवण दिलं.सर्वांनी रोजच्यासारखं पटकन गट्टम करून टाकलं. त्या सर्वांचं खाणं झाल्यावर त्यांना पुन्हा एकापाठोपाठ आऊटडोअरमध्ये सोडायला सुरुवात केली.

राजा,तारा, जेरी बाहेरील पिंजऱ्यात स्वतःहून गेले.शेवटी फक्त निकी राहिली होती.संपतला मी तिच्या पिंजऱ्याचं आतलं, आऊटडोअर सेक्शनकडे जाणारं दार उघडायची सूचना केली.त्याने चुकून बाहेरचं,पिंजऱ्याबाहेरचं म्हणजे प्राणिसंग्रहालयाच्या आवारातलं दार उघडलं. माझ्यासमोर निकी मोकळी उभी होती.त्या दाराबाहेर पडून ती गावभर फिरू शकली असती.प्रसंग बाका होता.प्रसंगावधान राखून मी निकीच्या डोळ्यांवर हात ठेवला आणि संपूर्ण ताकदीने तिला हलकेच दुसऱ्या दाराच्या दिशेने आत रेटली.संपतला बाहेरचं दार बंद करण्याची सूचना केली.संपतने लागलीच ते दार बंद केलं आणि निकी तिच्या पिंजऱ्यामध्ये पुन्हा एकदा ट्रॅप झाली.मी सुटकेचा निःश्वास सोडला.

राजा आमच्याकडे येऊन जवळपास १२-१३ वर्षं झाली होती.आता जेरीही चांगलाच आडदांड झाला होता. त्याचा स्वभाव मुळातच चिडका आणि आक्रमक होता. काही वर्षांपूर्वी राजा कुटुंप्रमुख आणि जेरी हा त्या कुटुंबातला बछडा होता.पण आता जेरीही वयात आला होता.काही दिवसांपासून आम्हाला राजा आणि जेरी यांच्यामध्ये एक सुप्त ताण जाणवू लागला होता.जणू त्यांच्यात सत्तेसाठी शीतयुद्ध सुरु झालं होतं.पुढे या शीतयुद्धाचं रूपांतर शारीरिक मारामाऱ्यांमध्ये होऊ लागलं.पुढचा धोका टाळण्यासाठी आम्ही त्या दोघांना एकदिवसाआड-एक दिवस आऊटडोअरमध्ये सोडण्याचा निर्णय घेतला.ते एकमेकांसमोर आलेच नाहीत,तर मारामारीला कारणच मिळणार नाही,असा आमचा अंदाज होता.दरम्यान,जेरीची आई निकी मात्र शांत असायची.याउलट,तारा मात्र जेरी आणि राजामधल्या संघर्षामुळे गांगरून जायची.आईच्या, म्हणजे निकीच्या सहवासामध्ये मात्र ती निवांत आणि कम्फर्टेबल असायची.

अशीच दोन वर्षं निघून गेली.दरम्यान राजा चांगलाच म्हातारा झाला होता.खूप थकलाही होता.त्याची भूकही मंदावली होती.कुटुंबप्रमुखाचं पदही त्याने मोठ्या मनाने सोडून दिलं.जेरी कुटुंबप्रमुख झाला.हे ट्रान्झिशन खूपच शांतपणे आणि आपसूक झालं.अत्यंत हॅण्डसम,देखणा असा आमचा राजा कायमचा रिटायर झाला. दरम्यानच्या काळात त्याच्या हालचालींत आणि सवयींतही खूपच बदल झाला होता.त्याच्या उमेदीत तो दररोज अडीच ते तीन किलो मटण पचवत असे;पण आताशा त्याचं जेवण दोन किलोवर आलं होतं.कधी कधी तर तो अगदीच कमी खाऊन झोपून जायचा, किंवा कधी कधी पूर्ण उपवासही करायचा.त्याच्या डोळ्यांतले नटखट भावही लोप पावले होते.हो,आमचा राजा आता म्हातारा झाला होता.

तारीख माझ्या आजही लक्षात आहे.१९ जुलै २००९. रविवारचा दिवस होता तो.मी सकाळी घरी वर्तमानपत्रं चाळत होतो.तेवढ्यात फोन वाजला.फोनवर विलास होता.विलास मोहोळ.त्या दिवशी तो पहिल्या पाळीच्या कामावर हजर होता.मी हॅलो म्हटल्यावर त्याने घाईघाईने बोलायला सुरुवात केली."सर,राजा कसंतरीच करतोय. म्हणजे काहीही करत नाहीय.नुसताच निपचित पडलाय.." या संवादापाठोपाठ त्याचा हुंदकाही मला ऐकू आला.लक्षात आलं,प्रकरण गंभीर आहे.मी तडक बिबट्याच्या पिंजऱ्यापाशी पोहोचलो.राजाच्या नटखट डोळ्यांतलं तेज संपून ते गारगोट्यांसारखे झाले होते. त्याची हालचाल थांबली होती.राजाच्या शरीरातून प्राण निघून गेले होते.आमचा राजबिंडा राजा माझ्या डोळ्यांसमोर अचेतन पडलेला पाहून मला रडू कोसळलं.सख्खा भाऊ किंवा पोटचा पोरच गेल्यासारखं मला वाटत होतं.माझ्यासाठी मोठाच धक्का होता तो. माझा जिवाभावाचा सखा मला सोडून निघून गेला होता.तो म्हातारा होत चालला होता हे आम्हाला दिसतच होतं,तरीही त्याच्या मृत्यूची तयारी माझ्या मनाने केली नव्हती.मी कसंबसं स्वतःला सावरलं. 

मी,विलास आणि तेजसने त्याला उचलून आतल्या पिंजऱ्यात नेलं.पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना बोलावलं. तिथे प्राथमिक तपासणी झाली आणि राजाला पोस्टमॉर्टमसाठी नेण्यात आलं.पोस्टमॉर्टमच्या अहवालानुसार राजाचा मृत्यू वार्धक्याने झाल्याचं स्पष्ट झालं.राजाच्या मृतदेहावर कायद्यानुसार अंत्यसंस्कार केले.त्याच्या निधनाची बातमी प्रेस नोट काढून माध्यमांना कळवली आणि घरी आलो.अचानक मला अतिशय रितं रितं वाटू लागलं होतं.रात्रीपर्यंत सतत कुणाचे ना कुणाचे फोन येत होते.ते मी यंत्रवतच घेत होतो.रात्री झोपलो तेव्हा अशक्य दमलेलो होतो.

दुसऱ्या दिवशी सकाळी लवकरच जाग आली.आधी बाहेर जाऊन सगळी वर्तमानपत्रं घरी घेऊन आलो आणि शांतपणे राजाच्या मृत्यूबद्दल आलेल्या सगळ्या बातम्या वाचून काढल्या.राजाबद्दल काय काय छापून आलंय हे वाचण्याची मला उत्सुकता होती.शिवाय शक्य तितका वेळ त्याच्या आठवणींमध्ये रमूनच मला त्या दुःखातून बाहेर पडता येणार होतं.पण पेपर वाचता वाचता एक भलतीच बातमी समोर आली.

एका हिंदी वर्तमानपत्राने राजाच्या मृत्यूला मीच जबाबदार असल्याचं छापून टाकलं होतं.ही बातमी छापणारा वार्ताहर ना कधी पार्कमध्ये आला होता,ना कधी मला भेटला होता. आम्ही काढलेल्या प्रेस नोटच्या बाहेर जाऊन त्याने हा जावईशोध लावला होता. राजाला आम्ही रात्रीच्या वेळी लोखंडी साखळीने बांधून ठेवायचो आणि त्यामुळेच त्याच्या गळ्याला जखम झाली असावी.ती जखम चिघळून त्यात किडे पडून त्याच्या अंगभर पसरून त्याचा मृत्यू झाल्याची धादांत खोटी बातमी त्याने छापली होती.खरं तर दखल घ्यावी एवढीही त्या बातमीची लायकी नव्हती.पण सार्वजनिक जीवनात कधी कुठल्या गोष्टीमुळे आग लागेल हे सांगता येत नाही.त्यात मी महापालिकेच्या कायम सेवेमध्ये नसल्याने खोटी असली तरी निगेटिव्ह बातमी छापून येणं माझ्या करियरच्या आणि पर्यायाने आमच्या प्राणिसंग्रहालयाच्या भवितव्यासाठी धोक्याचं होतं.मला भीती होती तेच झालं.ती बातमी शहरात सगळीकडे वाचली गेली आणि राजाचा मृत्यू हा विषय महापालिकेच्या प्रतिष्ठेचा आणि अस्मितेचा बनला. नगरसेवक लगेच प्रश्न विचारू लागले.इतर पेपरमध्येही बातम्या छापून आल्या.हा गोंधळ आठवडाभर सुरू होता.हा अपप्रचार कसा थांबवायचा हे मला कळत नव्हतं.तेवढ्यात अतिरिक्त आयुक्त सुभाष डुंबरे यांनी निवडक पत्रकार,अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांसमवेत अचानक आमच्या पार्कला भेट दिली.त्यात खोटी बातमी देणाऱ्या त्या हिंदी पेपरचा दुसरा एक पत्रकारही होता.डुंबरेसाहेबांनी पार्कमधले सर्व पिंजरे,खाद्याचं स्टोअर,किचन,हॉस्पिटल,लायब्ररी सगळं जातीने तपासलं.आमच्या एस.ओ.पी. म्हणजे स्टॅण्डर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर तपासून पाहिल्या.त्या भेटीदरम्यान सर्वांनाच, अगदी त्या पेपरच्या वार्ताहरालाही राजाच्या बाबतीतला आरोप खोटा असल्याचं पटलं.त्यानंतर डुंबरेसाहेबांनी पत्रकार परिषद बोलवून सर्वांच्या शंका दूर केल्या आणि या नाट्यावर एकदाचा पडदा पडला.प्रत्येक बिबट्याला स्वतंत्र कक्ष असताना त्यांना साखळीने बांधलं जातं असा आरोप करणारा तो पत्रकार मला पुन्हा कधीच भेटला नाही.प्रत्यक्षात त्याला विचारण्यासाठी माझ्याकडे काही बेसिक प्रश्न होते.उदा.बिबट्याला बांधण्यासाठी ग्रेट डेन जातीच्या कुत्र्याला वापरण्यात येणारी साखळी पुरेल की त्यापेक्षा जास्त क्षमतेची लागेल? बिबट्याची साखळी कशाला बांधावी? झाडाच्या खोडाला की भिंतीवर ठोकलेल्या एखाद्या मोठ्या खिळ्याला ? पण तशी संधी मला मिळाली नाही.हळूहळू दिवस जात गेले तसं पार्कचं रूटिन पूर्ववत झालं.माझ्या मनावरचा ताणही निवळला.राजाच्या जाण्याने तयार झालेली पोकळी मात्र भरून निघणं अवघड होतं.

◆◆◆ समाप्त ◆◆◆◆

6/10/26

बिबट्यांचा गोतावळा / Leopard dive

▶ कात्रजच्या प्राणिसंग्रहालयातल्या एका बिबट्याला काही कारणाने आमच्या पार्कमध्ये हलवायचा निर्णय झाला.आम्ही सगळे आनंदून गेलो.या बिबट्याचं नाव होतं राजा. पुढच्या काही दिवसांत आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करून राजा आमच्याकडे आला.हा आमच्या प्राणिसंग्रहालयातला पहिला बिबट्या.लवकरच राजा आमच्या प्राणिसंग्रहालयाचं आकर्षण ठरला आणि शहरातील आबालवृद्धांचा लाडका झाला. एक वर्षाचा राजा होताच रुबाबदार,इतर बिबट्यांपेक्षा देखणा.

अंगावरचा चकाकणारा कोट तर फारच अफलातून ! डोळे किंचित घारे आणि चेहऱ्यावर कायम बोलका भाव ! (सोयरे वनचरे,अनिल खैर,समकालीन प्रकाशन पुणे.)

काही वर्षांपूर्वी कोणाला तरी शेतात एक बिबट्याचं पिल्लू सापडलं.अण्णाने त्याला रेस्क्यू करून कात्रजच्या अनाथालयात ठेवलं.अनाथालयातल्या बाबा पटवर्धन नावाच्या कीपरने त्याला खूप छान सांभाळलं.त्यामुळे इतर कर्मचाऱ्यांनी पिल्लालाही बाबा म्हणायला सुरुवात केली.पुढे त्याला पेशवे पार्कला हलवलं.बाबा पुणेकरांचा लाडका होता. वयात आल्यावर तिथे त्याचं एका देखण्या मादीशी सूत जमलं आणि तिच्या पोटी राजा जन्माला आला.राजाची आई प्राणिसंग्रहालयातच लहानाची मोठी झाली होती.त्यातच पहिलटकरीण असल्याने तिचं बछड्याकडे नीट लक्ष नव्हतं.त्यामुळे पेशवे पार्कचा प्रमुख आणि आमचा मित्र डॉ.विनय गोऱ्हे

याने त्या पिल्लाला अण्णाकडे सोपवलं.तोवर या पिल्लाचे डोळेही नीट उघडलेले नव्हते.पण कात्रजच्या अनाथालयात आल्यावर हरीश घाटगे या कीपरने त्या बछड्याला स्वतःच्या पोरासारखं सांभाळलं.गाईच्या दुधात निरनिराळी प्रोटीन्स आणि पाणी मिसळून त्याला देत असत.थोड्याच दिवसांत राजाला चिकन मटणाच्या खिम्याचा खुराकही सुरू झाला.मग काय,राजा सणसणीत वाढला.सुट्टीच्या दिवशी माझी कात्रजला नेहमी चक्कर होत असे.तिथे गेलं की राजाशी खेळण मस्ट ! त्याशिवाय परत येताच येत नसे. 

खूपच खेळकर होता तो.माझे बूट पळवून त्यांची वाट लावणं हा त्याचा आवडता उद्योग.नेहमी भेटी होत असल्यामुळे आमची चांगली गट्टी होती. त्यामुळे राजाच्या आगमनासाठी मी विशेष उत्सुक होतो.राजा आमच्याकडे आला तेव्हा वर्षाचा होता. आमच्याकडच्या इतर प्राण्यांपेक्षा बिबट्या हा जास्त ताकदीचा,चपळ आणि खरोखर वन्य प्राणी होता. त्याच्यासाठी खास पिंजरा तयार करणं गरजेचं होतं. परदेशीसाहेबांनी नव्या पिंजऱ्यासाठी १० लाख रुपये मंजूर केले.पण नवा पिंजरा तयार होईपर्यंत एका बऱ्यापैकी पिंजऱ्यात राजाची तात्पुरती व्यवस्था केली.त्याच दरम्यान प्राणिसंग्रहालयाच्या कामानिमित्त दिल्लीला गेलो होतो. ती संधी साधून सेंट्रल झू अ‍ॅथॉरिटीचे मेंबर सेक्रेटरी एस.सी.शर्मा यांना भेटलो आणि त्यांना बिबट्यांसाठी पिंजरा उभारण्यासाठी मार्गदर्शन करण्याची विनंती केली. त्यांनी चंदिगढच्या प्राणिसंग्रहालयाचं नाव सुचवलं. तिथले बिबट्यांचे पिंजरे बघून त्यावरून आरेखन करण्याची सूचना केली.त्यांच्या सूचनेनुसार त्याच रात्री टॅक्सी करून चंदिगढ गाठलं.तिथले अधिकारी,कर्मचारी आणि इंजिनियर मंडळींची भेट घेतली,चर्चा केली. बिबट्याच्या पिंजऱ्याचे फोटो काढले,ड्रॉइंग्ज पाहिली आणि पुण्याला परतलो.

महापालिकेतले कार्यक्षम कार्यकारी अभियंता मदनमोहन सावळे यांच्याकडे आमच्या प्राणिसंग्रहालयाच्या विकासकामांची जबाबदारी होती.याच कामासाठी रामदास तांबे नावाचा उत्साही आणि अभ्यासू स्थापत्य अभियंता कार्यरत होता.मनोज तातुसकर नावाचा तरुण आर्किटेक्टदेखील आमच्या टीममध्ये सामील झाला.आम्ही चौघांनी बिबट्याच्या सवयी, आवडी-निवडी आणि स्वभाववैशिष्ट्यांचा अभ्यास करून पिंजऱ्याचं डिझाइन फायनल केलं.खर्चाला महापालिकेची मान्यता घेऊन टेंडर काढलं.प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक नगरकर यांना हे टेंडर मिळालं.त्यांनी मुदतीच्या आतच पिंजऱ्याचं काम पूर्णही केलं.सत्तर फूट लांब,तीस पस्तीस फूट रुंद आणि एकवीस फुट उंचीचा प्रशस्त पिंजरा राजासाठी तयार झाला.

पिंजरा तयार झाल्याच्या दिवशीच राजाला आम्ही नव्या पिंजऱ्यातील इनडोअर सेक्शनमध्ये हलवलं. आऊटडोअर सेक्शनमधील पाण्याच्या हौदाचा सिमेंट गिलावा पूर्ण करून त्या संध्याकाळी गवंडी मंडळी निघून गेली.दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर नेवाळेने राजाला आऊटडोअरमध्ये सोडलं.राजाने

पिंजराभर आनंदाने फेरफटका मारला आणि अजूनही ओल्या असणाऱ्या सिमेंटच्या गिलाव्यावर तो स्वतःच्या पाऊलखुणा उमटवून आला.यानंतर जेव्हा केव्हा पिंपरी-चिंचवड परिसरात एखाद्या बिबट्याचं आगमन व्हायचं,तेव्हा त्याच्या ठशांची तुलना करण्यासाठी राजाचे ठसे येऊन अभ्यासायचे असा एक प्रघातच पडला.

राजा आमच्याकडे आला आणि त्याला लवकरच नेवाळेचा लळा लागला.तो नेवाळेसोबत खूप खेळायचा,दंगामस्ती करायचा.संध्याकाळी त्याला इनडोअरमध्ये बंद करायला गेलं की तो हमखास नेवाळेच्या खांद्यावर उडी मारून त्याला वॉटर पाँडमध्ये पाडायचा.हा त्याचा आवडता खेळ होता. पण चुकूनही त्याने नेवाळेला इजा केली नाही.

पुढे सेंट्रल झू अ‍ॅथॉरिटीने प्राणिसंग्रहालयामध्ये कुठल्याही प्रजातीचा एकटा प्राणी प्रदर्शनासाठी ठेवायला बंदी घातली.त्यामुळे एक तर राजासाठी जोडीदार शोधणं भाग होतं.अन्यथा,त्याला इतरत्र हलवावं लागलं असतं.त्या वेळेपर्यंत पेशवे पार्कमधलं प्राणिसंग्रहालय कात्रजच्या नव्या, विस्तीर्ण आवारात शिफ्ट झालं होतं.हाच नियम त्यांनाही लागू असल्याने तिथल्या तत्कालीन प्रमुख डॉ.काझवीन उम्रीगर अस्वलाच्या मादीच्या शोधात होत्या.आमच्याकडे त्यांच्यासाठी मुन्नी,तर त्यांच्याकडे निकी नावाची बिबटीण.मुन्नीला कात्रजला हलवायचं आणि निकीला आमच्याकडे आणायचं असं ठरलं.हा निर्णय झाला तेव्हा निकी गरोदर होती.पण नेहमीप्रमाणे सरकारी कागदपत्रं प्रत्यक्षात हातात येईपर्यंत मध्ये बराच वेळ गेला आणि निकी आमच्याकडे आली ती थेट दोन बछड्यांसहित.

तोवर राजाला खास त्याच्यासाठी तयार केलेल्या भल्या मोठ्या पिंजऱ्या एकट्याने राहण्याची सवय झाली होती.तिथे आपल्या मर्जीचा राजा होता तो. त्यात आम्हा सर्वांचा लाडका.त्यामुळे त्याच्या जागेवर अतिक्रमण करणाऱ्या या नव्या पाहुण्यांचं आगमन त्याला सुरुवातीला फारसं मानवलं नाही. सतत गुरगुरत तो नापसंती व्यक्त करत असायचा. निकीलाही बहुधा त्याचा आडदांडपणा खुपत असावा.ती तारा आणि जेरी या आपल्या दोन बछड्यांच्या संगोपनात व्यस्त होती.काही दिवस पिल्लांसोबत निकी इनडोअरमध्येच राहिली. थोडया दिवसांनी आम्ही तिला आणि पिल्लांना आऊटडोअरमध्येही घेऊ लागलो.आता तारा आणि जेरी जोमाने वाढू लागले होते.एकत्र मिसळून राजाची सुरुवातीची नाराजी कमी झाली. सगळे एकत्र राहायला लागले आणि आपोआपच राजा कुटुंबप्रमुख झाला. 

बिबट्यांचं हे कुटुंब आमच्या पार्कमध्ये चांगलंच स्थिरावलं.तारा आणि जेरी चार महिन्यांचे झाले होते.सुरुवातीला हे दोघं फक्त दूध पीत होते.ते हळूहळू मटण किंवा चिकनचा खिमा चापू लागले. आताशा चिकनचे तुकडेही ते मोठ्या आवडीने खायला लागले होते.निकी त्यांना वेगवेगळे खेळ शिकवण्यात मग्न झाली होती.त्यांची शाळा पाहण्यात राजाही बहुधा आनंदी होत असावा. आम्हाला आणि प्रेक्षकांनाही मजा येत होती.

एका शांत दुपारी गणपत धावत-पळत माझ्याकडे आला आणि धापा टाकत म्हणाला,"सर,तारा पिंजऱ्याच्या वरच्या अढीवर चढून बसली आहे आणि घाबरून वरच्यावरच फिरतेय." ताबडतोब तिथे गेलो आणि तिथलं दृश्य पाहून अवाक झालो. तारा पिंजऱ्याच्या चेनलिंकवरून चढून एकवीस फुटांवरच्या लोखंडी आढ्यावर जाऊन बसली होती! तिला खाली आणण्यासाठी आमच्यापैकी कुणाला तरी वर चढणं गरजेचं होतं.मीच ते काम करायचं ठरवलं.दोन लाकडी शिड्या एकमेकांना बांधून तिच्या जवळ पोहोचलो.तेवढ्यात ती दुसऱ्या आढ्यावरून चालत माझ्यापासून दूर गेली.खाली उतरून नवीन जागी शिडी लावली आणि पुन्हा एकदा चढून वरपर्यंत गेलो;पण तिने पुन्हा एकदा जागा बदलली.हा प्रकार दोन तास चालला.आता मात्र मी प्रचंड थकलो होतो.घामाने चिंब झालो होतो.त्यामुळे शर्टही काढला होता.प्रेक्षक मात्र खूपच खूष झाले होते.दोन रुपयांत भरपूर करमणूक ! घामाघूम झालेला 'बनियन मॅन' आणि त्याला खेळवणारं 'लेपर्ड कब'! थकून,हताश होऊन खूप वेळ एका ओंडक्यावर विमनस्क अवस्थेत बसून राहिलो.

वर पाहिलं,तर बहुतेक तारालाही आता या पळापळीचा कंटाळा आला असावा.एका जागी ती काही क्षण स्थिर झाली.समोरच्या लोखंडी अँगलवर तिने पुढचे पाय रोवले आणि मागचे पाय शांतपणे खाली सोडून ती तिथे लटकली.त्यानंतर पुढचा डावा पाय काढून उजव्या पायावर लटकली. त्यानंतर हलकेच एकेक नख मोकळं करत गेली आणि शेवटी एकाच नखावर तिचं संपूर्ण शरीर तोल धरून होतं.काही क्षण असेच गेले आणि हलकेच आपलं नख सोडवून ती खाली झेपावली आणि धपकन माझ्यासमोर अवतरली.जणू काही काहीच घडलं नसल्याच्या आविर्भावात माझ्या मांडीवर नेहमीसारखी शांतपणे येऊन बसली. माझ्याबरोबरचे सगळे कर्मचारी आणि प्रेक्षकही अवाक झाले.तारा आणि जेरीचे असे उपद् व्याप कायमच सुरू असत.

शिल्लक भाग पुढील लेखामध्ये…!!

6/8/26

गांधीवाद इतिहासजमा झाला ? / Has Gandhism become history?

कित्येक लोक आता म्हणू लागले आहेत की,भारताला स्वराज्य मिळालेच नाही.जागतिक परिस्थिती बदलली, युद्धे अंगाशी आली म्हणून इंग्रजांना येथून जावे लागले. सशस्र क्रांतिकारकांची सरकारला भीती वाटली. म्हणूनही ते येथून गेले.त्यांना लोकांनी विचारले की, "एवढ्या मोठ्या देशातून इंग्रजांना जावे लागेल,तसेच ते इतर लहान मोठ्या प्रदेशांतूनही गेले असते पण तसे झाले नाही.हे का?"

गांधींनी देशात अभूतपूर्व जागृती आणली,राष्ट्रीय जीवनाला नवा पाया दिला,हिंदू संस्कृतीला नवे वळण लावले आणि जगात भारताला मानाचे स्थान मिळवून दिले ही गोष्ट नाकबूल करता येणार नाही.इतर देशांनादेखील गांधींपासून प्रेरणा आज मिळत आहे ही गोष्ट ध्यानात आणली पाहिजे.या गोष्टी ज्यांना मान्य आहेत असे लोकदेखील आता म्हणू लागले आहेत की गांधीजींची लोकोत्तर कामगिरी मान्य,पण आता त्याचे महत्त्व किती? फार तर गांधीजींविषयी कृतज्ञता व्यक्त करू.पण गांधी आता इतिहासजमा झाले आहेत एवढे गांधीवाद्यांनी मान्य केले पाहिजे.

कित्येक लोक गांधीजींचे धार्मिक,आध्यात्मिक आणि सांस्कृतिक क्रांतिकार्य मान्य करतात पण राजकारणात ह्या वस्तूंना महत्त्व देऊ इच्छित नाहीत.अशा लोकांना उत्तर दिले पाहिजे.

सर्वच लोक स्वीकारतात की गांधीजींची हिंदुस्थानाला आणि जगाला सर्वांत मोठी देणगी म्हणजे सत्याग्रह.तो तर गांधीवादी राज्यकर्त्यांनी सोडून दिला.इतकेच नव्हे तर सार्वत्रिक बहुमताने चालणाऱ्या सरकारविरुद्ध सत्याग्रह होऊच शकत नाही,असा प्रचार करून त्यांनी जिकडे तिकडे सत्याग्रहाला विरोध चालविला.याचा परिणाम असा झाला की काही लोक म्हणू लागले, "एरव्ही तेव्ही सत्याग्रहाला नेत्यांचा पाठिंबा मिळणार नाही आणि सत्याग्रहाला चारित्र्याचा भक्कम पाठिंबा असावा लागतो तेव्हा त्या रस्त्याने जाच कशाला? बहुमताच्या जोरावर चालणारे प्रजाराज्य कधीही खंबीर असत नाही.अशा राज्याचा एक डोळा असतो पुढची इलेक्शने जिंकण्यावर,तेव्हा सत्याग्रहापेक्षा हत्याग्रह चांगला." हत्याग्रहाविरुद्ध गोळी चालवण्याची पोलिसांना मुभा असते हे खरे.पण नेत्यांना त्याची भीती बाळगण्याचे कारण नाही.कारण हत्याग्रह सुरू होण्यापूर्वीच नेत्यांना सरकार पकडून ठेवते.आणि थोडी शांतता होताच लोकक्षोभ टाळण्यासाठी नेत्यांना तुरुंगातून सोडून देते.त्यामुळे नेत्यांना भिण्याजोगे काही नसते.

हत्याग्रहात सामान्य लोकांपैकी थोडी लोकं मरतात हे खरे पण तेवढ्या बलिदानाच्या जोरावर पुष्कळ मिळवता येते.

अशा रीतीने विचार करणाऱ्या लोकांनी हाकाटी चालवली आहे की,"आजच्या काळात गांधीविचार कितपत ग्राह्य आहे? कितपत व्यवहार्य आहे?"

गांधी होऊन गेल्या गोष्टीला शंभर दोनशे किंवा हजार वर्षे झाली नाहीत.दहावीस वर्षात काळ बदलत नसतो. तेव्हा त्या प्रश्नाचा अर्थ एवढाच होतो की गांधींच्या काळी लोकांत स्वार्थत्याग करून देशसेवा करण्याची वृत्ती होती.उच्च जीवनाची प्रेरणा झाल्यास तिचा स्वीकार करून लोक बलिदानाला तयार होत.तसे आता आम्ही उरलो नाही.

आम्हाला निवडणुका जिंकून राष्ट्रीय सत्ता आणि संपत्ती वापरण्याची संधी मिळवावयाची आहे.या कामी गांधीवाद काय मदत करणार? एवढाच वरील प्रश्नांचा अर्थ होतो.गांधींनी कोठेही म्हटले नाही की लोकनियुक्त सरकार कधीच चुका करणार नाही आणि त्याच्या विरुद्ध सत्याग्रह होऊच शकत नाही!आणि सत्याग्रह हे काही फक्त सरकारविरुद्ध वापरण्याचे शस्त्र नव्हे. व्यक्तिगत जीवनात,सामाजिक जीवनात,राष्ट्रीय जीवनात आणि आंतरराष्ट्रीय संबंधांत तेजस्वी,सात्त्विक लोकांनी केव्हाही वापरण्याचे ते शस्त्र आहे.ते नेहमी पाजळून तयार ठेवावयाचे असते.सत्याग्रहाचे शेवटचे बळ म्हणजे जगातील सर्व तेजस्वी सज्जनांचा त्याला पाठिंबा मिळत असतो आणि दुर्जनांनादेखील हे शस्त्र वापरणाऱ्या पक्षाची तेजस्विता आणि नैतिक श्रेष्ठता स्वीकारून तिच्यापुढे मान वाकवावी लागते. सत्याची ही शक्ती अपार आहे आणि सार्वभौम आहे. एवढा विश्वास ज्यांच्यात आहे तेच लोक खरे आस्तिक.स्वराज्य होताच आणि नेत्यांच्या हाती अधिकार येताच त्यांनी ठरवून टाकले की आता या देशात आमचे राज्य झाले.त्यामुळे सत्याग्रहाला आधार राहिला नाही.लोकांनीही पाहिले की खरा सत्याग्रह करू जाता,या गांधीवादी नेत्यांचाही पाठिंबा मिळणार नाही. तेव्हा अन्याय दिसला तरी डोळेझाक करून गप्प बसणे हाच मार्ग आहे.Nature shores vacuum. निसर्गामध्ये म्हणजेच जगामध्ये पोकळी फार वेळ टिकू शकत नाही.पोकळी उत्पन्न झाली की ती जागा भरून काढण्यासाठी कसले तरी तत्व धावून येतेच.

सत्याग्रहाला अवकाश राहिला नाही तेव्हा ती जागा हत्याग्रहाने घेतली.आणि हा हत्याग्रह वाटेल तसल्या लोकांनी चातुर्याने हाती घेतला.वर म्हटलेच आहे की,लोकसत्तात्मक राज्यात हत्याग्रह चालविणारे नेते सुरक्षित असतात.लढाईत ज्याप्रमाणे सैनिकांचा बळी द्यावाच लागतो त्याचप्रमाणे भावनेला वश होणाऱ्या सामान्य लोकांना थोडासा वाव दिला अथवा होऊ दिला तर पुष्कळसे काम होते.हे चातुर्य आजच्या लोकनेत्यांमध्ये आहे.

आणि जे सरकार सत्याग्रहाला दाद देत नाही त्या सरकारला हत्याग्रहापुढे नमावेच लागते.

यालाच जर 'आजचा काल' म्हणावयाचा असेल तर लोकांनी खुशाल म्हणावे.अशा कालोचित मार्गाने कोणतेही लोकनियुक्त सरकार सहज पाडता येईल.पण त्याच्या ठिकाणी दुसरे तेजस्वी किंवा समर्थ सरकार स्थापन होणे शक्य नाही.एकामागून एक सरकारे कोलमडून पडू लागली म्हणजे जनता आणि नेतृत्वाचे उमेदवार लोक डिक्टेटरशिपचे आवाहन करतात,"या निवडणुका नकोत,लोकमताचा खेळखंडोबा नको, मारील त्याला तलवार या न्यायाने नादीरशाही स्थापन केली पाहिजे."

आपल्याला एक खूणगाठ बांधून ठेवलीच पाहिजे,की हिंदुस्थानात आपल्याला स्वर्ग उत्पन्न करता येईल. नरकही उत्पन्न करता येईल पण डिक्टेटरशिप या देशात कधीही येऊ शकणार नाही.एखादा मंत्र बोलल्याबरोबर स्थापन होणारा तो राज्यप्रकार नव्हे,

हिंदुस्थानाची जनता एकजिनसी (Homogenous) नाही.

हिंदुस्थानची फौज एकजिनसी नाही (आणि हेही लक्षात ठेवले पाहिजे की ज्याला आपण हिंदुसमाज म्हणतो त्यातही आंतरिक एकजिनसीपणा नाही).किती का असेना,एक मनुष्य डिक्टेटर म्हणून उभा राहताच त्याला प्रतिस्पर्धी दुसरा डिक्टेटर उभा राहणारच.आणि दोघांनाही जनतेचा पाठिंबा मिळणार.फौजेची निष्ठादेखील अशा डिक्टेटरांमध्ये वाटली जाणार.मग यांनी वाटल्यास एकमेकांना मारून क्षीण व्हावे किंवा देशाचे तुकडे पाडून लहान लहान राज्ये स्थापन करावीत.

दहा हजार वर्षांच्या आपल्या इतिहासात राजनैतिक एकता केव्हा व किती वर्षे टिकली याचा हिशोब काढला पाहिजे.'आविक्षित' सारखे वेदकालीन सम्राट केवढ्या मुलखावर राज्य करीत होते.

आणि त्यांचे स्वराज्य अथवा साम्राज्य किती टिकले यांची चर्चा न करणे बरे! आपले सर्व सम्राट राजसूय यज्ञ करून सम्राट झाले. त्यांचे ते साम्राज्य दोन पिढ्या चालले की नाही याची वानवाच आहे.बाकी हिंदू काळात अधिकांश तर लहान लहान राज्येच होती.या राज्यांचे आपापसात हेवेदावे चालत.सामान्य प्रजा शांततावादी,शांतताप्रेमी आणि सांस्कृतिक एकता चालवणारी हाती.प्रजेला स्वदेशी-परदेशी कोणीही राजा असो,चालत असे.

त्याने लोकजीवनात ढवळाढवळ न केली म्हणजे बरे.आणि त्याने ढवळाढवळ केली तर जनता ईश्वराची प्रार्थना करीत असे की,देवा,

आता अवतार घे आणि आम्हाला या जुलमातून वाचीव.

सत्यवानाचा पिता लोकप्रिय राजा होता.त्याला गादीवरून हाकून लावणाऱ्या राजाविरुद्ध प्रजेने काहीच केले नाही.राजा गेला वनवासाला आणि प्रजा मुकाट्याने बसून राहिली.पुढे देवाला दया आली. शत्रूचा नाश झाला.प्रजा आनंदली.

म्हणूनच तर कोट्यवधी जनतेच्या देशात लाखाहून कमी परकीय लोक घुसून राज्य करू शकले.

परकीय लोकांनी या देशातील लहान लहान राजांना पाळीपाळीने परास्त करावे.संबंध देश पादाक्रांत करावा. पण चार क्षत्रिय एकत्र होऊन लढणार नाहीत.पठाणांनी येऊन हिंदुस्थानावर प्रत्येक ठिकाणी आपली राज्ये स्थापन केली.तत्पूर्वी शंभर वर्षे तरी ते या देशात येऊन लोकस्वभाव अजमावू शकले होते.हीच गोष्ट मोगलांची. त्या दोघांना अनुभव आला की येथील लोक विदेशी आक्रमणकारी लोकांचे राज्य मजबूत करायला तटस्थ असतात.

ते खाल्ल्या मिठाला जागतील आणि स्वदेशी रक्ताचा द्रोहदेखील करतील.जो कोणी अन्न देईल त्याच्याशी स्वामिनिष्ठ राहिलेच पाहिजे असे मानणाऱ्या लोकांना परक्याचे अन्न खाऊ नये असा उपदेश कुणीच दिला नव्हता.

आजही परक्याचे अन्न खाऊ नये असा बाणा दिसून येत नाही ! राजनैतिक एकता आपण टिकवू शकू असा आत्मविश्वास आज किती लोकांत आहे?आणि सांस्कृतिक एकता तर भूतकाळाची उपासना करून, जुने हेवेदावे जिवंत ठेवून,

कधीच उत्पन्न करता येत नाही.हा सार्वभौम सिद्धान्त नेत्यांच्या डोक्यात तरी कधी आला आहे का? सांस्कृतिक एकता समाजाच्या जोरावरच उत्पन्न करता येते.सांस्कृतिक एकता जर मजबूत करावयाची तर भूतकाळाचे ध्यान धरून चालणार नाही.त्यांना भविष्यकाळ समजला पाहिजे. समन्वयाच्या जोरावर तो निर्माण करता आला पाहिजे. जे लोक भूतकाळ विसरू शकत नाहीत त्यांना वर्तमानकाळात सुप्त असलेले सामर्थ्य ओळखता येत नाही.गांधींना हे ओळखता येत होते

त्यांनी आत्मघाती चर्चा न करता,राष्ट्राला समन्वयाचा रस्ता दाखवून दिला आणि आंतरिक एकता वाढविण्यासाठी उदारतेचा उपदेश शहाणपणाने कसा करावा हेही दाखवून दिले.खरे म्हणावयाचे म्हणजे, गांधींचा पूर्ण उपयोग आजच आहे.त्यांच्या मार्गाने जाण्याची हिम्मत दीर्घदृष्टी आणि कुशलता जर आपण मिळवू शकलो तर आजचे जटिल प्रश्न सोडविता येतील. जे लोक गांधीमार्गाला कालबाह्य ठरवतात त्यांनी आजचे प्रश्न सोडविण्याचा एकही मार्ग अमलात आणून दाखवला नाही.वादाच्या इरेस पेटलेल्या एकाने जोराने म्हटले,"जीवनात हरलो तरी बेहत्तर पण वादांत आम्ही हार खायला तयार नाही." माणूस सहज बोलून गेला खरा पण त्याने आपल्या लोकांच्या स्वभावावर या एका वाक्याने चांगलाच विदारक प्रकाश पाडला आहे.

आज जगात युद्धाची तयारी सर्वत्र चालत असते.या क्षेत्रात पुढारलेली राष्ट्रे दोन,रशिया आणि अमेरिका.या दोन्ही राष्ट्रांजवळ आज शस्त्रांचा साठा इतका तयार आहे की जगाचा नाश त्यांना तीन वेळा करता येईल.तरीही हे लोक युद्ध छेडू धजत नाहीत. त्यांना कळून चुकले आहे, युद्धाच्या अंती एका पक्षाचा विजय आणि दुसऱ्याचा पराजय ही स्थिती आता उरली नाही. आधुनिक शस्त्रास्त्रे वापरून युद्ध सुरू केले तर दोन्ही पक्षांचा सर्वनाश खात्रीने होणार याविषयी शंका उरली नाही. या दोन्ही राष्ट्रांचे पुढारी म्हणतात,युद्धावर आमचा विश्वास नाही.पण सैन्यावाचून आणि आधुनिक शस्त्रास्त्रांवाचून राष्ट्र सुरक्षित कसे राहील

हे आम्हाला समजत नाही.म्हणून आम्ही युद्धाची तयारी ठेवून आहोत.पण ही तयारी दिवसेंदिवस इतकी महाग होत आहे.युद्धात राष्ट्राचे रक्त सांडेल तेव्हा सांडेल पण तत्पूर्वी युद्धाच्या तयारीतच राष्ट्र- रक्ताचे भयंकर शोषण करावे लागत आहे.

तेव्हा एकीकडे युद्धाला तयारी तर दुसरीकडे आपापल्या बाजूला अनेक राष्ट्रांना खेचून गटबंदीचे राजकारण आणि तिसऱ्या बाजूने सामोपचाराचे प्रयोग अजमावून पाहणे.अशी त्रिविध राजनीती चालू आहे.पहिले दोन प्रकार जुन्या विचाराचे,अप्रतिष्ठित पण जोरावर आणि तिसरा प्रकार हळूहळू विश्वमान्य होण्याच्या मार्गावर.ही आहे जागतिक परिस्थिती.जागतिक नेतृत्व करणाऱ्या लोकांना आता गांधीविचाराकडे ध्यान देण्याचे सुचू लागले आहे.

स्वराज्य आल्यानंतर मी जगाचा प्रवास केला.अमेरिका पाहून घेतली.दोनदा युरोपात आणि आफ्रिकेत थोडे डोकावून पाहिले.एकदा चीन सरकारच्याच मदतीने त्या देशात थोडे फिरून घेतले आणि जपानात तिकडच्या लोकांच्या आमंत्रणामुळे आणि अधिकांश त्यांच्याच खर्चाने पाचदा जपानात जाऊन आलो.सर्वत्र लोक म्हणतात,गांधीजींच्या तेजस्वी सत्याग्रहाने आम्ही आकर्षित झालो.जगावर दरारा चालवणाऱ्या ब्रिटिश साम्राज्याच्या तावडीतून त्यानी देश स्वतंत्र केला. त्यामुळे आम्हाला अंधुक आशा वाटू लागली की त्यांचा मार्ग कदाचित उपयोगी ठरेल.आम्ही गांधींना श्रेय देतो ते त्यांच्या सत्याग्रहाच्या कोऱ्या कल्पनेसाठी नव्हे.कल्पना कुणालाही करता येते.पण या कल्पनेच्या जोरावर त्यांनी राष्ट्राला तयार केले.भारतीय जनतेने त्यांच्या हाकेला ओ दिली.आवश्यक असा त्याग करून दाखवला.या वस्तुस्थितीने आम्ही प्रभावित झालो.आणि म्हणून मोठ्या आशेने स्वराज्य-प्राप्तीनंतरच्या भारताच्या कामगिरीचे आम्ही अत्यंत आस्थेने अध्ययन चालविले आहे.या वीस वर्षांत गांधींच्या मार्गान तुमच्या देशाने एकही पाऊल पुढे टाकले नाही.यामुळे आता आम्हाला वाटू लागले आहे की भारतीय जनतेमध्ये तेजस्विता आहे,गांधीनी ती जागृत केली,पण तसे नेतृत्व त्यांच्या देशात आज उरले नाही.तेव्हा गांधीमार्ग खरा.


जनतेची संस्कृतीदेखील आशास्पद.पण ती शिकवून तिचा उपयोग करणारे नेतृत्व मात्र गांधींना पुढे चालविता आले नाही.किंवा गांधींची प्रेरणा पचवून तुमच्या राष्ट्रनेत्यांना राष्ट्रीय शक्ती प्रगट करून दाखविता आली नाही.आम्हाला गांधीवादाविषयी जी आशा वाटत होती तिच्यावर भारताच्या नेत्यांनी पाणी फिरविले,याचे आम्हाला फार वाईट वाटते.

जपानातील काही विचारवंत मला म्हणालेदेखील गांधी असताना आम्हाला भारताविषयी आदर आणि प्रेम.वाटत होते.या वीस वर्षानंतर आमचे प्रेम कायम आहे,आदर मात्र तुम्ही लोकांनी घालविला,याचे आम्हालाच वाईट वाटते.

जितकी वर्षे गांधीजी जगले त्या ७० / ८० वर्षांना गांधीयुग काय म्हणून म्हणावे? ते तर जगाच्या दृष्टीने युद्धयुग होते.या साठ ते सत्तर वर्षात किती तरी युद्धे झाली आणि तीही जागतिक युद्धे झाली! या युगात गांधीजींनी अहिंसायुगाचे बीज पेरले.त्याला जर गांधीयुग म्हणावयाचे असेल तर ते बीज उगवल्यानंतरच म्हणता येईल.जे गांधीयुग अजून उगवलेच नाही ते संपले असे म्हणणाऱ्यांना ऐतिहासिक दृष्टीच नाही. गांधीयुग या पुढेच उगवणार आहे.विज्ञानाच्या लोकोत्तर विकासामुळे युद्धे सर्वनाशी होणार इतकी खात्री ज्यांना झाली आहे,दोन तीन युद्धांमुळे ज्या लोकांच्या प्रत्येक घरातील तरुणांचे रक्त सांडले आहे,त्या लोकांनाच गांधीविचार,गांधीसाधना आणि गांधीनिष्ठा लवकर पटण्याचा संभव आहे.सत्याग्रहाचा जन्म झाला आफ्रिकेत.त्याचा राष्ट्रव्यापी प्रयोग गांधीनी करून दाखविला भारतात.हे जसे अद्भुत स्थलांतर झाले, त्याचप्रमाणे सत्याग्रहाची आणि गांधीपणाची विशाल प्रयोगभूमी भारत आणि विजयभूमी अन्यत्र असे होणार असेल तर आश्चर्य वाटण्याचे कारण नाही.

जेव्हा जेव्हा आपण गांधीजींना महात्मा म्हणत असू तेव्हा तेव्हा ते खरोखर दुःखी होत असत.ते म्हणत,"मी जे करतो ते प्रत्येक मनुष्याला साध्य आहे.मला अवतारी पुरुष ठरवून माझ्या कार्याचा नाश करू नका.मी जे करतो ते तुम्हाला शक्य आहे.तुम्ही ते केले पाहिजे.माझे अनुकरण करणे हाच माझी कदर करण्याचा एकमात्र प्रकार आहे.एरव्ही मला अवतारी पुरुष ठरवून देवाची प्रार्थना करत बसला की 'देवा,आम्ही तर तुच्छ माणसे. जर तुला लाज असेल तर दुसरा अवतारी पुरुष पाठवून दे' तर देवाला तुमची दया येणार नाही."

संतवचनांपैकी एकच वचन गांधींनी सिद्ध करून दाखविले-"नर करणी करे तो नरका नारायण हो जाय" गांधींना इतिहासजमा करणे म्हणजे राष्ट्राला दुर्दैवी आणि करंटे बनविणे आहे.गांधीमार्गाचा उज्ज्वल इतिहास बनविण्याचे दिवस समोर असताना गांधींना भूतकाळात जमा करणे म्हणजे राष्ट्राचा घात करून त्याला भूतलोकात पाठवून देणे आहे.खरोखर आपल्याला आपल्या राष्ट्राची दया वाटली पाहिजे की त्याचे नेतृत्व इतके आंधळे आणि निरुत्साही होऊ पहात आहे.

हा लेख संपला.पुढील लेख पुढील लेखमालेत..!!