पृथ्वीतलावरील अनेक अक्षांश प्रदेशात साधारण शरद ऋतूमध्ये पानझड होते आणि वसंतात नवीन पालवी फुटते.आपण हे गृहीतच धरलेलं असतं.पण जरा निरखून बघितलं तर हे एक मोठं गूढच आहे.कारण असं होण्यासाठी झाडांना वेळेचं भान हवं.हिवाळा येत आहे हे त्यांना कसं कळतं? किंवा वाढलेली उष्णता ही तात्पुरती नाही तर वसंत ऋतूचे आगमन होत आहे,हे तरी कसं कळतं ?
उबदार दिवसात झाड आपल्या पानांची वाढ करतं हे तर्कशुद्ध आहे,कारण खोडातील द्रव्य वितळले तरच पुन्हा त्याचा प्रवाह सुरू होतो.पण जेव्हा हिवाळा जास्त कडक असतो तेव्हा पानं लवकर उमलतात,हे मात्र आश्चर्यकारक आहे.टेक्निकल युनिव्हर्सिटी ऑफ म्युनिकच्या शास्त्रज्ञांनी या घटनेचा हवामान नियंत्रित प्रयोगशाळेत शोध घेतला.हिवाळा थोडाजरी कमी थंड असला तरी बीचच्या फांद्यांना उशिरा पालवी फुटत होती.प्रथमदर्शनी त्यांना हे तर्कहीन वाटलं,कारण जास्त गरमी असलेल्या वर्षांमध्ये वाइल्ड फ्लावर सारखी अनेक वनस्पतींची वाढ जानेवारीतच सुरू होते आणि काही काहींना फुलेही धरतात.अनेकदा याची बातमी वृत्तपत्रातून येते.कदाचित असे असेल की प्रचंड गारठा असेल तरच झाडांना गाढ झोप मिळते.अशी प्रफुल्लित करणारी गाढ झोप नाही मिळाली तर वसंतात ते लगेच कामाला लागू शकत नाहीत.कारण काहीही असो. हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर हा एक तोटाच आहे, कारण इतर प्रजाती अशा प्रकारे थकलेल्या नसतात. आपली पालवी ते लगेच वाढवू लागतात आणि शर्यतीत पुढे जातात.
जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये उबदार वातावरण आपण अनेकदा अनुभवलं आहे.तेव्हा ओक किंवा बीचला पालवी फुटलेली नसते.अजून वाढीला सुरुवात करायची नाही,हे त्यांना कुठून कळतं? हे कोडं आपल्याला सुटू लागलं आहे,किमान फळं लागणाऱ्या झाडांचे तरी. झाडांना मोजता येतं हे आता आपल्या लक्षात येत आहे! काही ठरावीक उष्ण दिवस गेले की मगच वसंत ऋतूच्या आगमनाची खात्री झाडांना पटते.पण फक्त उबदार दिवसांनीच वसंत ऋतू आले,असं मानलं जात नाही.पानझड आणि नवीन पालवी फुटणे या दोन्ही गोष्टी जशा तापमानावर अवलंबून असतात तशा दिवसाच्या लांबीवरही असतात.
उदाहरणार्थ,दिवसातले किमान तेरा तास उजेड असला की मगच बीच वृक्ष नवीन पालवी सुरू करतात.हे फारच आश्चर्यकारक आहे,कारण असे करण्यासाठी झाडांना कोणत्यातरी प्रकारची दृष्टी पाहिजे.त्या दृष्टीचा शोध पानातच घेणं योग्य ठरतं.कारण त्यांच्यामध्ये सौर ऊर्जा झेलण्यासाठी जणू एक यंत्रच असते.
उन्हाळ्यात झाड सौर ऊर्जा घेत राहतात पण एप्रिलमध्ये अजून पालवी फुटलेली नसते.हे गुपित आपल्याला नीट कळलं नाही, पण बहुधा ही क्षमता कोंबांमध्येसुद्धा असते.कोंबांमध्ये पानं घडी घातलेल्या अवस्थेत शांतपणे बसलेली असतात.ती सुकून जाऊ नये म्हणून त्यांच्यावर तपकिरी रंगाचे आवरण असते.पानं वाढू लागली की या आवरणाकडे नीट बघा.त्याला प्रकाशासमोर धरले की ते पारदर्शक असल्याचे जाणवेल.अगदी थोडा सूर्यप्रकाश असला तरी त्यावरून दिवस किती मोठा आहे ते खोडांना,कोंबांना कळून चुकते.ही क्षमता तर शेतात उगवणाऱ्या काही तणांनाही असते.थोडा चंद्रप्रकाश जरी पडला तरी त्यांच्या बिया रुजायला सुरुवात होते. अशाच प्रकारे झाडाच्या खोडांनाही सूर्यप्रकाश पडल्याचे जाणवते.बहुतांश झाडांच्या खोडामध्ये निद्रावस्थेत असलेले कोंब असतात.आपला शेजारी वठून पडला की झाडाला अधिक ऊन मिळू लागते आणि मग हे कोंब बाहेर पडून प्रकाशाचा फायदा घ्यायला सज्ज होतात.
द हिडन लाईफ ऑफ ट्रीज
पी ट र वो ह्ल ले बे न
अनुवाद - गुरुदास नूलकर
अरविंद घनश्याम पाटकर
मनोविकास प्रकाशन
पण गरमीचे दिवस वसंत ऋतूचे आहे आणि उन्हाळ्याचा शेवट नाही हे झाडांना कळतं कसं ? तापमान आणि दिवसाची लांबी या दोन्हीच्या आधाराने झाडाला हे जाणवतं.तापमानात वाढ होते तो वसंत ऋतू.तापमान घटू लागते तेव्हा शरदऋतू हेही झाडांना माहीत असते.आणि म्हणूनच उत्तर गोलार्धावरील ओक किंवा
बीच वृक्ष जेव्हा आपण दक्षिण गोलार्धात वसलेल्या न्यू झीलंडला निर्यात करतो तेव्हा ही झाडं तिथल्या उलट ऋतूचक्राशी अनुकूलन करून घेतात. आणि हो,झाडांना स्मरणशक्ती असते हेही यातून सिद्ध होते.नाहीतर त्यांना दिवसाची लांबी किंवा गरमीचे दिवस कसे मोजता येतील?
शरद ऋतूत जर का उष्णता नेहमीपेक्षा जास्त वाढली तर मात्र झाडं गोंधळून जातात.सप्टेंबर महिन्यातच त्यांचे कोंब वाढू लागतात आणि काही झाडांवर चक्क नवीन पालवी धरते.हिवाळा उशिराने आला की या गोंधळलेल्या झाडांना मात्र त्याचे परिणाम भोगावे लागतात.या नव्याने वाढलेल्या रोपट्यांचे लाकूड टणक न झाल्यामुळे ते थंडीचा मुकाबला करण्यासाठी तयार नसतात,आणि त्यांच्याबरोबर पानंही हतबल असतात. आणि मग पानांची हिरवाई गोठून जाते.हे झाडांना नक्कीच दुःखदायक असणार.आणि त्याहून वाईट म्हणजे हे कोंब निकामी झाले की पुढच्या वसंतात पुन्हा नवीन कोंब करण्यासाठी ऊर्जा खर्च करावी लागते. झाडाने सावधगिरी बाळगली नाही तर ते अशक्त राहून येणाऱ्या ऋतूचा सामना करणे त्यांना मुष्कील जाते.
पालवी फुटण्याची वेळ ठरविण्याव्यतिरिक्तही झाडांना वेळेचे भान असणे गरजेचे असते.विशेषतः प्रजननात हे महत्त्वाचे असते.
त्यांच्या बिया जर शरद ऋतूत जमिनीवर पडल्या तर त्या लगेच रुजणे अपेक्षित नाही. तसं झालं तर दोन समस्या निर्माण होतात.पहिली समस्या, नाजूक कोंबांना टणक होण्यास वेळ मिळालेला नसतो म्हणून ते गारठून जातात.आणि दुसरं म्हणजे थंडीच्या काळात हरणांना खाद्य कमी असल्यामुळे ते या ताज्या हिरव्या कोंबांवर तुटून पडतात.म्हणून इतर सर्वांबरोबर वसंत ऋतूमध्ये रुजणे हेच शहाणपणाचे असते.त्यासाठी बियांना थंडीची जाणीव असते.उष्ण दिवस सलग आले की मगच ही पिल्ले आपल्या सुरक्षा कवचातून बाहेर पडतात. झाडांसारखी व्यवस्थित मोजण्याची क्षमता अनेक बियांना नसते आणि म्हणून खारी किंवा 'जे' पक्षी जेव्हा बीचचे दाणे एखाद-दोन इंच जमिनीत पुरतात तेव्हा त्यांचे फावते.जमिनीच्या या भागात वसंत ऋतूचे पूर्ण आगमन झाल्याशिवाय ऊब नसते.बर्च सारख्या हलक्या बियांना मात्र जास्त लक्ष द्यावे लागते.त्यांच्या पंखांच्या साहाय्याने ते जमिनीवर पोचून शांतपणे वाट पाहात पडलेले असतात.ते कुठे पडतात,यावर त्यांना भरपूर सूर्यप्रकाश मिळेल की पालकांसारखे त्यांनाही सबुरीने 'त्या' दिवसाची वाट पाहावी लागेल हे ठरते.
प्रश्न चारित्र्याचा..!!
'ह्यूमेल' या माझ्या गावातून 'आहर' दरीकडे जाणाऱ्या रस्त्यावर तीन ओक वृक्ष आहेत.भारदस्तपणे ते तिथे उभे आहेत आणि म्हणून या भागाला त्यांच्या नावाने सन्मानित केले आहे.सुमारे शंभर वर्ष जुन्या असलेल्या या वृक्षांमध्ये जेमतेम काही इंच अंतर आहे.हे जरा विलक्षण आहे आणि याचा अभ्यास करण्याची मला चांगली संधी आहे.
कारण तीनही वृक्ष अगदी एकसारख्या पर्यावरणीय परिस्थितीत वाढले आहेत.काही यार्डाच्या अंतरावर जमीन,पाणी आणि सूक्ष्म हवामान वेगळे असणे शक्य नाही.म्हणजे जर या तीन वृक्षात काही फरक असला तर तो त्यांच्या अंगभूत गुणधर्मामुळे असणार.आणि या तिघांचेही आचरण वेगळे आहेच!
हे वृक्ष थंडीत बोडके असताना किंवा उन्हाळ्यात गर्द पालवीने भरलेले असताना कुणी धावत्या गाडीतून यांच्याकडे पाहिले तर हे तीन वृक्ष आहेत,हे जाणवणारच नाही.जवळ असल्यामुळे हा एकच डेरा असल्याचे भासते आणि तिन्ही खोडं एकाच मुळापासून निघाल्यासारखे वाटते.छाटलेली झाडे पुन्हा उगवताना काही वेळा असे होते.पण तिन्ही ओक वृक्ष शरद ऋतूत वेगवेगळे रंग धारण करतात.उजवीकडचा ओक जेव्हा रंग बदलायला लागतो तेव्हा मधला आणि डावीकडचा अजून हिरवाच असतो.या दोन आळशी झाडांना आपल्या मित्रासारखे निष्क्रिय होण्यासाठी अजून दोन आठवडे तरी लागणार असतात.पण जर ते एकाच परिस्थितीत वाढतात तर मग त्यांच्या वागणुकीत हा फरक कुठून येतो? यावरून असं दिसतं की,पानं झडण्याची वेळ स्वभावाप्रमाणे बदलते.आधीच्या प्रकरणात पाहिल्याप्रमाणे पानझडी वृक्षांना आपली पाने झडून टाकावी लागतात.पण त्याची बरोबर वेळ कोणती? झाडांना थंडी पडण्याची बरोबर वेळ माहीत नसते.हिवाळा कडक असणार का सौम्य तेही ठाऊक नसते.त्यांना फक्त दिवस लहान होत चालल्याची आणि तापमान घटत असल्याची जाणीव होते.पण शरद ऋतूतले काही दिवस असाधारणपणे उष्ण असतात. अशा वेळेस मात्र ओक वृक्ष संभ्रमात पडतात.या हवेत प्रकाश संश्लेषण करून थोडी जास्त ऊर्जा आणि साखर बनवून ठेवायची का? की कधीही हिमवृष्टी होऊ शकेल याची सावधगिरी बाळगून पानं झडून टाकायची? या समस्येचे निवारण प्रत्येक झाड वेगळ्या पद्धतीने करत असल्याचे स्पष्ट दिसते.
उजवीकडचे झाड जरा जास्त चिंता करणारे आहे किंवा अधिक समजूतदार आहे म्हणू या.पानझड करता आली नाही आणि पूर्ण हिवाळा मरणाच्या भीतीत घालवावा लागला तर जास्त अन्नसाठा पुरवठा करून ठेवण्याचा काय फायदा? म्हणून ते वेळच्या वेळी पानझड करून स्वप्नांच्या जगात पाऊल ठेवते.पण इतर दोन वृक्ष मात्र जरा जास्त धीट आहेत.पुढला वसंत ऋतू कसा असेल किंवा कीटकांनी आक्रमण करून ऊर्जा संपवली तर खिशात काय राहणार,असा विचार करून ते अधिक काळ हिरवे कपडे घालून असतात.आणि सालापासून मुळापर्यंत जमेल तिथे तुडुंब साठा भरून ठेवतात. आजपर्यंत तरी त्यांच्या या आचरणाचा त्यांना फायदाच झालेला आहे,पण हे किती काळ चालेल कोणास ठाऊक? जागतिक तापमान बदलामुळे शरदातील तापमान जास्त काळ टिकते आणि यांची पानं धरून ठेवण्याची युक्ती नोव्हेंबरपर्यंत फायदेशीर ठरते.पण याच काळात शरदातील वादळे न चुकता येत राहतात. यामध्ये पानांनी भरलेले झाड पडण्याचा धोका जास्त असतो.माझ्या अंदाजाप्रमाणे अशा वेळेस सावधानता बाळगणारी झाडं जगण्याची शक्यता जास्त असते.
पानझडी वृक्ष आणि सिल्वर फरच्या खोडावर असेच काही तरी दिसून येते.झाडांच्या शिष्टाचार नियमावलीप्रमाणे यांची खोडे नितळ आणि उंच असली पाहिजेत.म्हणजे खालच्या भागावर फांद्या नकोत,हे शहाणपणाचे आहे.कारण खाली फारसा सूर्यप्रकाश पोचत नाही.म्हणून उगीचच खालच्या भागातले अवयव वाढवून त्यांना पोसत बसण्याची जरूर नाही.हे साधारण आपल्या शरीरासारखेच असते.जे स्नायू वापरले जात नाही त्यांना आपले शरीर फार पोषण देत नाही.पण फांद्या झाडांना स्वतःहून काही तोडता येत नाहीत.त्या गळून पडण्याची त्यांना वाट पाहावी लागते.त्यांना बरशीच्या हवाली सोडन दिले की लाकूड कुजून त्या मरून जातात आणि विघटन होऊ पुन्हा त्यांचा सेंद्रिय माल मातीत मिसळतो.अशा प्रकारे फांदी जिथे तुटते तिथे झाडाला जखम होते.बरशी खोडापर्यंत वाढू शकते कारण आता तिथे साल नसते.पण ही परिस्थिती झाडाला बदलता येते. पडलेली फांदी जर एखादा इंच जाड असली तर काही वर्षांतच तिथे साल धरते.आता तिथे आर्द्रता वाढवून झाड बुरशीला मारून टाकते.पण जर तुटलेली फांदी फारच जाड असेल तर या प्रक्रियेला दीर्घकाळ लागतो. जखम काही शतके उघडी राहते आणि तिथून बुरशी आत शिरून लाकडापर्यंत पोचते.खोड कुजून अशक्त होतं.आणि याच कारणासाठी झाडांच्या शिष्टाचाराच्या नियमावलीत खालच्या भागात फक्त छोट्या फांद्या असाव्यात असं फर्मान असतं.झाड वाढताना ही खालची फांदी जर तुटून गेली तर तिथे पुन्हा नवीन फांदी येऊ द्यायची नसते. पण काही झाडं नेमके हेच करतात.
शेजारचा एखादा वृक्ष मेला आणि सूर्यप्रकाश पोचू लागला की,काही झाडं खोडाच्या खालच्या भागातही कोंब वाढवू लागतात.या फांद्या जाड झाल्या की सुरुवातीला फायदेशीर ठरतात,कारण झाडाला आता वरच्या आणि खालच्या दोन्ही भागातून प्रकाश संश्लेषण करता येणं शक्य असतं.पण एके दिवशी,सुमारे वीस एक वर्षानंतर इतर झाडं आपला डेरा इतका वाढवितात की सूर्यप्रकाश पडणारी फट बंद होऊन जाते.आता पुन्हा खालच्या भागात अंधार पडतो आणि खालच्या जाड फांद्या मरून जातात.अशा प्रकारे आपल्या हव्यासाचा परिणाम झाडाला भोगावा लागतो.पुढच्या वेळेस तुम्ही जंगलात गेला आणि एखाद्या झाडाने अशा प्रकारची वाढ केली असेल तर त्यातून त्याचे चारित्र्य दिसून येईल.झाडाचा हा स्वतःचा निर्णय असतो,याचा अनुभव तुम्हाला येईल.जंगलाच्या उघड्या भागात वाढणाऱ्या झाडांकडे जरूर पहा.त्या सर्वांना असे बेपर्वा कृत्य करण्याचा मोह होतो,पण काही थोडेच जण तसे करतात.आणि इतर झाडं मात्र आपलं खोड नितळ ठेवून सुरक्षित राहतात.
समाप्त…!!