* विजय गायकवाड | Vijay Gaikawad

live

नमस्कार आपले स्वागत आहे. मी पुस्तके आणि मित्रांवर पैसे खर्च करतो,माझ्याकडे दगड आणि विटांवर खर्च करण्यासाठी पैसे नाहीत.- रस्किन बाँड.ही थोर माणसं व त्यांचे विचार मला पुस्तकात भेटलीत.ती भेटली आणि त्यांनी सांगितले कि, प्रत्येक दिवशी असं काही तरी करा की,ते तुम्हाला अधिक सुंदर उद्याच्या दिशेने खूप लांबवर घेऊन जाईल."- डोग फायरबाऊ.' सर्वियन कादंबरीकार मिलोराद पावीच यांचे एक वाक्य आहे ते म्हणतात - जोवर जगात पुस्तक वाचणाऱ्या वाचकांची संख्या बंदूकधारी सैनिका पेक्षा अधिक आहे तोवर काळजीच काहीच कारण नाही.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात.पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये.म्हणून अविरतपणे प्रयत्न करणारे मार्गदर्शक, मित्र धावून येतात.प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,डॉ.दीपक शेटे,आ.भरत बुटाले,प्रा.सर्जेराव राऊत,सुभाष ढगे,अनिल फारणे,डॉ.सुधीर सरवदे ,विश्वास खाडे, विनायक पाटील,संजय कुंभार,सतीश खाडे,मनोहर सुर्वे,गणेश खंदारे,तात्या गाडेकर, दादासाहेब गाडेकर, दादासाहेब ताजणे, पुस्तकातील घटना प्रसंग सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील यांनी केलेले आहे. मला लिहिण्याची प्रेरणा देणारी पुस्तके,लेखक,प्रकाशक,मित्र ही जगावेगळी माणसं माझ्या जीवनातील महत्वाचा टप्पा आहेत.... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ.मेघा गायकवाड, चिरंजीव मयान,माझ्या धावण्यातील गुरुवर्य नामदेव बरुरे,लुल्ला शेख मोठी ताई ,लहान ताई जयश्री शिंदे या सर्वांचेच मनापासून आभार व धन्यवाद मॅट्रिक फेल विजय गायकवाड

4/27/26

ग्रंथसंग / book company


ग्रंथांचिया द्वारी,जग बदलू पाहणाऱ्या विचारांची यात्रा अतुल देऊळगावकर,प्रकाशक - विश्वकर्मा पब्लिकेशन पुणे एकूण २८ ग्रंथसंग आपण क्रमशः सुरु करीत आहोत.

शाळेची सुटी संपल्यावर काही शिक्षक 'काय वाचलं?' असे विचारत.तेव्हा वर्गात शोभा होऊ नये यासाठी काळजी घेणे भाग होते.घरातील वातावरणामुळे विविध प्रसंगी येणारे नरहर कुरुंदकर,अनंतराव भालेराव, वसंतराव पळशीकर,पन्नालाल सुराणा,पुष्पाबाई भावे यांच्याकडून हमखास येणाऱ्या ह्याच कठीण प्रश्नाला उत्तर देणे अनिवार्य होते.ही महनीय मंडळी वयाने व ज्ञानाने अतिशय लहान असणाऱ्या बालकांशीही मनापासून बोलत असत.यातूनच 'काय वाचावं?' हे आवर्जून सांगत.शिक्षणाच्या व नोकरीच्या निमित्ताने पुण्यात असताना समर नखाते,माधुरी पुरंदरे यांच्या 'माध्यम' पथनाट्य चळवळीत सामील झाल्यावर 'तोच' प्रश्न धाकदायक होत गेला.नंतर 'ग्रंथाली' वाचक चळवळीमुळे दिनकर गांगल,कुमार केतकर,अरुण साधू यांच्या गाठीभेटी वाढत गेल्या.तेव्हाही भेटीतील आरंभीची विचारपूस 'याच' दडपण आणणाऱ्या प्रश्नाने होत असे.तर अशा ह्या 'अटळ' प्रश्नाला उत्तर देण्याची तयारी करणे भागच होते.ह्या सर्वार्थाने ज्येष्ठ मंडळींच्या बोलण्यातून येणारे संदर्भ समजले नाही,तर तो भयंकर अपमान वाटत असे.त्यामुळे संदर्भ आलेल्या पुस्तकांचा शोध घेणे अगत्याचे होते.ह्या बुजुर्गांच्या घरी जाण्याची संधी मिळाली,तर त्यांच्या ग्रंथसंग्रहाकडे मनःपूर्वक पाहत,नोंदी करून घेणे आवश्यक वाटायचे.वाचायचे तर अफाट आहे.वाचनाचा क्रम कसा असावा? ही समस्या कधी सुटलीच नाही.'वाचनशिस्त आली नाही.

खूप काही राहून गेलं आहे',ही जाणीव सातत्याने टोचत राहते.अशा ह्या सदोष,अ-रेषीय व अ-परिपूर्ण वाचनप्रवासात अनेक लेखक-कवी माझ्यासोबत येत बरेच काही देऊन गेले.'आपण फारच छोटे आहोत. आपला शब्दसंग्रह थिटा आहे.आपल्याला भाषावैभव कधी येणार? आपली दृष्टी ही भंगलेली, विखंडित आहे.' ही टोचणी कायमची आहे व तशीच राहणार.त्यामुळे 'दृष्टी समग्र व विशाल करण्याच्या आटोकाट प्रयत्नात' काही लेखक-कवी-कलावंतांना कायम सोबत ठेवावे लागते.जे. कृष्णमूर्ती,विनोबा भावे,तुकाराम,पं. कुमार गंधर्व,मर्वेकर,विंदा,एलकुंचवार,एरिक फ्रॉम ह्यांच्या सतत सहवासात राहून शिकत राहणे सुरूच आहे.

वर्गमित्र दीपक देवधरमुळे भगतसिंगांचे 'मी नास्तिक का आहे?" हातात आले.वयाच्या अवघ्या तेविसाव्या वर्षी फासावर जातानाही न डगमगता परमेश्वराला नाकारण्याचे आंतरिक धैर्य असणाऱ्या विवेकी भगतसिंगाने पछाडून टाकले.विख्यात इतिहासकार बिपिन चंद्र यांनी १९७० मध्ये मूळ गुरुमुखीतील ह्या पुस्तकाचा इंग्रजी अनुवाद केला आणि लोकवाङ्गय गृहामुळे ते लवकरच मराठीत आले.ह्या पुस्तकामुळे भगतसिंगांच्या वाचन व्यासंगाची माहिती देशाला झाली. मृत्यू समोर दिसत असताना विलक्षण शांत व संयमी राहणारा हा तरुण वाचनात गढून गेला होता. शोषणरहित आदर्श समाजाचे स्वप्न उराशी बाळगून होता.फाशीचा क्षण आला,तेव्हाही हा धीरोदात्त महावीर पुस्तकात रममाण झाला होता. 'मी नास्तिक का आहे?' मुळे वाचनाची आवश्यकता मनात ठसली गेली आणि विवेकी विचारही बळकट झाला.

महाराष्ट्रातील पथनाट्य चळवळीचे जनक समर नखाते यांच्या अभ्यासवर्गात अक्षरशःविश्वरूपदर्शन होत असे. 'व्यक्तीचं व समाजाचं वर्तन कसं व का? हे समजलंच पाहिजे.राजकारणाचे व व्यवस्थेचे स्वरूप समजून घेण्यासाठी अर्थकारण समजून घेतलं पाहिजे.तसंच कोणीही कोणताही प्रश्न विचारला तर आपल्याकडे उत्तर असलं पाहिजे,'असे बजावत ते आपल्याला न पडणारे प्रश्न टाकून अस्वस्थ करत.त्यांच्या बोलण्यात मढेकर, विंदा,तुकाराम,नामदेव ढसाळ,इरावती कर्वे,नारायण सुर्वे,किरण नगरकर,भाऊ पाध्ये,कुमार केतकर यांच्यापासून फ्रॉइड,मार्क्स,अ‍ॅडम स्मिथ,जॉन केनेथ गालब्रेथ,रसेल,एरिक फ्रॉम,नोम चोम्स्की,एडवर्ड सैद, असे अनेक संदर्भ येत.माधुरी पुरंदरे यांच्याकडून दि.बा मोकाशी, म. वा. धोंड,त्र्यं. ना. अत्रे,ताराबाई शिंदे, लक्ष्मीबाई टिळक,गोडसे भटजी ते व्हानगोंग,पिकासो, रेम्ब्रा,सार्ज, सिमोन द बोव्हा,कुरोसावा,बर्गमन इत्यादींचे उल्लेख होत असत.मग त्या संदर्भाचा जमेल तसा पाठलाग सुरू केला.सोबतचे अनिल झणकर,दीपक देवधर,अश्विनीकुमार धर्माधिकारी,कामोद देशपांडे या मित्रांशी गप्पा मारताना 'वाचलं पाहिजे' हे ध्रुपद कायम असे. 'ते काय वाचतात? आपलं काय राहिलंय? आपण किती मागे?' ही भावना दाटून येत असे.त्या काळात (१९७८ ते १९८४) सर्वांच्या भेटीगाठींचे ठिकाण होते - 'कॅफे डिलाइट'! (गुडलक चौकातील 'हॉटेल वाडेश्वर'च्या जागी).तिथे तास न् तास बसल्यावर कला,राजकारण, समाजकारण यांवरील अनेक संदर्भ ऐकू येत.एकंदरीत सर्वत्र श्रवणभक्ती करताना आपल्या अत्यल्पज्ञानाचा साक्षात्कार पदोपदी होत असे.अशा वातावरणात वाचले तरच मी वाचणार होतो.त्या टप्प्यात मानवतावादी तत्त्वज्ञ,सामाजिक मानसशाखज्ञ एरिक फ्रॉम (१९००-१९८०) यांनी बराच काळ धरून ठेवले.फ्रॉम यांनी हिटलरच्या आगमनानंतर मायदेश जर्मनीला रामराम ठोकला.आधी स्वित्झर्लंड व पुढे ते अमेरिकेत वास्तव्यास गेले.औद्योगिक क्रांतीनंतर जगाची होत असलेली वाटचाल ते पाहत होते.त्यांच्या 'द सेन सोसायटी' (१९५५) मध्ये त्यांनी भांडवलशाही अमेरिका व साम्यवादी सोव्हिएत युनियन ह्या दोन्ही व्यवस्थांचे धारदार विच्छेदन केले होते.१९८२ मध्ये हे पुस्तक घेणे भाग पडले होते.पाठोपाठ वसंतराव पळशीकर यांनी सुचविल्यामुळे रॅचेल कार्सन यांचे 'सायलेंट स्प्रिंग' (१९६२) घेतले.ह्या दोन्ही पुस्तकांनी त्या काळातील प्रचलित विचारसरणींपेक्षा निराळ्या रीतीने पाहण्याची दृष्टी (लॅटरल थिंकिंग) दिली.सोव्हिएत युनियनच्या स्थापनेपासूनच त्यांच्यात आणि अमेरिका यांच्यात संघर्ष जाणवत होता.दुसऱ्या महायुद्धाच्या काळात आणि त्यानंतर ह्या दोन्ही देशांनी त्यांच्या आधिपत्याखालील देश वाढवून आपापला साम्राज्यविस्तार सुरू केला.यातूनच शीतयुद्धाचा आरंभ झाला. (जॉर्ज ऑर्वेल यांनी 'तुम्ही आणि अणुबाँब' ह्या निबंधात 'कोल्ड वॉर' ही संज्ञा मांडली होती.) साम्यवादी व भांडवलशाही ह्या दोन्ही विचारांनी 'निसर्गाला अंकित करून विकास' घडवला. युद्धसज्जतेसाठीच अवकाश संशोधन,

अणुऊर्जा, संगणक ह्या तंत्रज्ञानातील शोधमोहिमा सुरू होत्या.या काळातच जगभर निसर्गाच्या मनमुराद विध्वंसाचा पाया घातला गेला आणि त्यामध्ये भांडवलशाही व साम्यवादी या दोन्ही विचारसरणी एकाच दिशेने प्रवास करू लागल्या.वसाहतीतून मुक्त झालेल्या अनेक नव्या देशांनी हाच कित्ता गिरवला.ह्या पार्श्वभूमीवर,फ्रॉम यांनी 'द सेन सोसायटी'त वास्तव दाखवले होते,आपल्या लोकशाहीमुळे समाज हा सभ्य व सुसंस्कृत होत नाहीए.व्यक्तींची व समाजाची आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिक अशा सर्व बाजूंनी प्रगती झाली,तरच समाज प्रगत होईल.त्याची कारणमीमांसा करताना ते म्हणतात,माणसाने स्वतःला निसर्गापासून अलग करीत निसर्गविनाश चालू केला.पुढे समाजापासून वेगळे होत व्यक्तिवाद जोपासला. व्यक्तिस्वातंत्र्य व व्यक्तिवाद यात गल्लत करीत अतिरेकी व्यक्तिवादी होऊ लागला.ह्या प्रक्रियेत चढत्या भाजणीने वस्तुसंचय करू लागला.दरम्यानच्या काळात, बाजारपेठ अतिशय शक्तिमान होत व्यक्तींवर ताबा मिळवू लागली.बाजारानेच नीती व मूल्ये ठरविण्याचा मक्ता घेतला.बाजाराची भाषा सर्रास घराघरांत ऐकू येऊ लागली.पैशाला अतिरेकी महत्त्व येत गेले. पैसा हेच मोजमाप सर्वत्र लागू होताच कमीतकमी काळात व कमीतकमी कष्टांत अधिकाधिक पैसा हे आयुष्याचे ध्येय झाले.'बाजार' हे मूल्य व्यक्ती व समाज, नाती व नीती सारं काही घडवत जाते.यातून माणसांना असुरक्षितता,अनिश्चितता,एकाकीपणा ह्या भावनांनी ग्रासून टाकलं आहे.पूर्वी माणसाला गुलाम होण्याची भीती होती.बाजारपेठ हीच सार्वभौम होत चालल्याने भविष्यात माणूस यंत्रमानव होण्याची शक्यता आहे. असा भविष्यवेध करून फ्रॉम यांनी 'वो सुबह हमीसे आएगी' अशी आशा दाखवत 'मानवतावादी समुदायवादा'ची (ह्यमुनिस्टिक कम्युनिटिरॅनिझम) मांडणी केली.त्यांना उदार व उन्नत समाज अपेक्षित होता.'कोणीही कोणावर सत्ता न गाजवता एकमेकांशी साहचर्याने जुळवून घेणारा,इतरांविषयी बंधुभाव व वात्सल्याची भावना असणारा,व्यक्तीचा सातत्याने गुणात्मक विकास होण्यास पोषक वातावरण असणारा समाज घडवावा लागेल.' हे फ्रॉम यांचे स्वप्नरंजन असे संबोधून हिणवण्यापेक्षा,अशी स्वप्ने पाहणे आवश्यक असल्याची जाणीव तेव्हा झाली होती.आजही ती तशीच टिकून आहे.फ्रॉम यांनी मूलभूत समस्यांचा अन्वय लावणारी,'बियाँड द चेन्स ऑफ इल्युजन - माय एनकाउंटर्स विथ मार्क्स अँड फ्रॉइड','झेन बुद्धिझम अँड सायकोॲनॅलिसिस', 'द आर्ट ऑफ लिसनिंग','ऑन बिईंग ह्युमन' अशी अनेक मौलिक पुस्तकं लिहिली आहेत.व्यक्ती व समाज यांच्या वर्तनाची अनेकांगी चिकित्सा करणाऱ्या फ्रॉम यांचा पाठपुरावा करणे,मला गरजेचे होते.त्यांनी 'फिअर ऑफ फ्रिडम'मधून सांगितले,'स्वतःची जबाबदारी स्वतः घेऊन निर्णय घेताना माणसाला ताण येतो. त्यामुळे स्वातंत्र्याचं भय वाटून पलायनवादी माणसं आपला ताबा ईश्वर, बुवा, नेता यांच्याकडे द्यायला सहज तयार होतात.'

प्रेम ही एक कला आहे, हे स्पष्ट करताना 'द आर्ट ऑफ लव्हिंग' (१९५६) मध्ये फ्रॉम लिहितात, 'दुसऱ्या व्यक्तींची मालकी मिळवणे,तिच्याकडून अपेक्षापूर्ती करून घेणे म्हणजे प्रेम नव्हे.प्रेम ही नैसर्गिक बाब वा भावना नसून,ती एक साधना आहे.त्यासाठी आत्मप्रेमातून बाहेर पडून स्वतःमध्ये शिस्त व संयम,तसेच दुसऱ्या व्यक्तीविषयी विश्वास व आदर असावा लागतो.एका विशिष्ट व्यक्तीशी नातं प्रस्थापित करण्यापुरतं मर्यादित असतं ते 'प्रेम' नाही.तो विस्तारलेला अहं असतो.सर्व माणसांविषयी,प्राणिमात्रांविषयी प्रीती वाटणं ही विशाल व व्यापक प्रेमभावनेची खूण आहे.'

फ्रॉम यांनी 'द अ‍ॅनाटॉमी ऑफ ह्युमन डिस्ट्रक्टिव्हनेस' (१९७३) या पुस्तकात आक्रमकपणाचे सखोल व बहुआयामी विश्लेषण केलं आहे.टिकून राहण्यासाठी, स्व-रक्षणार्थ,उपजत येतो तो 'सौम्य आक्रमकपणा' असतो.इतरांचा ताबा मिळवणे,त्यांचा छळ करण्यात आनंद घेणे,ह्या प्रवृत्तींमधून 'विध्वंसक आक्रमकपणा' निर्माण होतो.अशी मांडणी करीत फ्रॉम यांनी हिटलर, मुसोलिनी,हिमलर यांच्या वर्तनाचे सखोल व सूक्ष्म पातळीवर मनोविश्लेषण केले आहे. (ह्या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर मानवी चेहऱ्यावरचे ओरखडे दाखवले होते. ते पाहताना शाळेतील पत्र्याच्या पाटीवर ब्लेडने ओरखडल्यावर येणाऱ्या कर्कश आवाजाचा अथवा फुलपाखराला हातात पकडून त्याचे एकेक पंख छाटतानाच्या क्रौर्याचा भास होतो.) 'आत्मकेंद्रितता वा आत्मप्रेमामुळे आक्रमकता वाढीस लागते.कधीकधी एखादा समूहच आत्ममग्न होऊन इतरांना तुच्छ लेखत, त्यांच्याशी क्रूरपणे वागू लागतो.अशा समूहात सामील व्यक्तींना त्या सर्वश्रेष्ठ असल्याचे भास होऊ लागतात. त्यामुळे त्यांना हिंसक होताना वावगं न वाटता ते कर्तव्यच वाटू लागते.आक्रमक वृत्ती ही जैविक (बायॉलॉजिकल) नव्हे.(तसा सिद्धांत डेसमंड मॉरिस व आपल्याकडे विजय तेंडुलकर यांसारखे अनेक जण मांडत होते.) एकमेकांविषयी प्रेम व आदर,सहकार्य व साहचर्य हे नैसर्गिक आहे.त्यासाठी माणूस व निसर्ग यांना केंद्र मानून विकास करणारा समाज घडवला पाहिजे,'असं ते म्हणतात.

फ्रॉम यांच्या अखेरच्या काळातील लिखाणातून बौद्ध विचार अधिकाधिक येत गेले.कित्येक वेळा त्यांच्या मांडणीत जे.कृष्णमूर्तीचा भास होत असे.

'सर्व बंधनं व चौकटींच्या पलीकडे जाताना तूच तुझा दीप हो' हे त्याचे तात्पर्य होते. (शांती, करुणा, सहकार्य, एकवटलेपणाची भावना यांमुळे मेंदूत सकारात्मक व सुखावह बदल होतात, असे अलीकडील मेंदुशास्त्रातील अनेक संशोधनांत दिसून येत आहे.) 

'सायलेंट स्प्रिंगमुळे विश्वाचा समग्र विचार करण्यातून पर्यावरण जपण्याची जाणीव निर्माण झाली.'ही पृथ्वी केवळ माणसांचीच नाही,तर ती सर्व वनस्पती व प्राण्यांचीही आहे.आर्थिक विकासाच्या नादात हे भान ठेवलं पाहिजे.या जीवसृष्टीच्या साखळीमधील प्रत्येक कडी तेवढीच महत्त्वाची आहे.कुठलीही कड़ी तुटली, तर विश्वाची जैविक लय बिघडून जाईल.माणसाने निसर्गाला बाधा आणणारा विकास सुरू ठेवल्यास तो विनाशाकडे नेईल.' या विचारांना हळूहळू जग गंभीरपणे घेऊ लागले.'सायलेंट स्प्रिंग'मुळे जगाची विचार करण्याची रीत बदलून गेली.

विख्यात निसर्गवादी वृत्तपटकार सर डेव्हिड अ‍ॅटनबरो म्हणतात,'चार्ल्स डार्विन यांच्या 'ओरिजिन ऑफ स्पिसिज'नंतर वैज्ञानिक विश्वाला बदलून टाकणारं पुस्तक म्हणजे 'सायलेंट स्प्रिंग!'

१९८५ साली सोव्हिएत युनियनचे अध्यक्ष मिखाईल गोर्बाचेव्ह यांनी शस्त्रस्पर्धा थांबवून अण्वस्त्र निकामी करण्यास सुरुवात केली आणि शीतयुद्धाच्या अंताचा आरंभ झाला.१९९१ला सोव्हिएत युनियनच कोसळल्यावर शीतयुद्ध समाप्त झाले,त्यानंतर मागील ३० वर्षांत निसर्गविनाशाचा वेग गेला.त्यासोबतच हवामानबदलाच्या समस्या वाढत गेल्या.अजूनही विविध कारणांनी फ्रॉम यांचे संदर्भ येतच राहतात.फ्रॉम यांनी माणसाला जीवसृष्टीविषयी असणाऱ्या उपजत प्रेमाला 'जीवाकर्षण (बायोफिलिया)' म्हटले होते.२०१९ मध्ये पर्यावरणाचे तत्त्वज्ञ प्रो.ग्लेन अलब्रेख्त यांनी जीवाकर्षण या संकल्पनेचा विस्तार केला.

अल्ब्रेख्त यांच्या मते,'माणसाला केवळ स्वतःच्या परिसराविषयीच नव्हे, तर सजीव-निर्जीवांसकट असलेल्या व्यापक विश्वाविषयीचा जिव्हाळा व आकर्षण असतं व ते वाढलं पाहिजे.' या समग्र विचाराला ते 'विश्वाकर्षण' (सोलीफिलिया) म्हणतात. तर अमेरिकी विचारवंत प्रो.मायकेल सँडल यांनी समुदायवादाची निकड सांगताना म्हटले आहे,"व्यक्तिवादामध्ये सांस्कृतिक व आर्थिकदृष्ट्या व्यक्ती हीच केंद्रस्थानी असते. समुदायाची सांस्कृतिक व आर्थिक प्रगती झाल्यास व्यक्तींची आपसूकच होते व व्यक्तींचे आपापसांतील संबंधही सुधारतात.'पुढे कुमार केतकरांमुळे जे.कृष्णमूर्ती वाचत गेलो.'जीवनदृष्टी' ह्या पुस्तकातून ते अस्तित्व,प्रेम, आनंद,भय, दुःख यांविषयी मूलभूत प्रश्न विचारत हादरवून सोडतात.ते म्हणतात,

'आपल्याला निसर्गाकडे वा माणसांकडे निखळ पाहताच येत नाही.अनुभव वा ज्ञान यांमुळे आपण पूर्वग्रह तयार करतो आणि ते घेऊनच व्यक्ती वा प्रसंगांना सामोरे जातो. निसर्गात सर्व काही नित्य नव्याने व सहज होत असते.

तसे आपण प्रत्येक घटनेकडे कुठलाही आग्रह,पूर्वग्रह न ठेवता मोकळेपणाने पाहावे.प्रेमाने व कुतूहलाने पाहिल्यास आपल्याला साधेपणातील सौंदर्य दिसेल. आकाश,झाडं,पानं,फुलं,पक्षी यांतील रंग गंध,आकार, ध्वनी व स्पर्श यांतील सौंदर्य उमजून येईल.' सद्यः परिस्थितीविषयी ते सांगतात,'निसर्गाशी असलेलं नातं तुटताच मानवताही संपुष्टात येते.मग तुम्ही स्वतःच्या नफ्यासाठी वनस्पती असो वा प्राणी,सरोवर असो वा नदी,सर्वांची सर्रास हत्या करीत सुटता.तुमच्यामुळे भयग्रस्त झालेला निसर्ग स्वतःचे सौंदर्य आकसून घ्यायला लागतो.' बदलांसंबंधी त्यांना अनेक प्रश्न विचारले जात.ते म्हणत, विज्ञान ज्या वेगानं प्रगती करत आहे,त्या वेगानं माणसाचं मन प्रगत होत नाही.आता प्रत्येक व्यक्तीला स्वतः सोडून इतर कोणालातरी बदलावयाचं आहे; परंतु त्याने आधी स्वतःला बदललं पाहिजे,स्वतःची सफाई केली पाहिजे.'

याच काळात पं.कुमार गंधर्व यांचे गायन,मुलाखती, तसेच त्यांच्यावरील लेख यांतून एक विशाल दालन खुले होत गेले.कुमारजी म्हणत,'मी कधीही शाळेत न गेलेला एक जीव आहे;परंतु मी असं मानत आलोय,'की, येणारा प्रत्येक क्षण,प्रत्येक अनुभव हा मला काही शिकवण्यासाठीच आला आहे.'त्यांची श्रोत्यांबद्दल 'आपण कधीच समाधानी होता कामा नये.

तुम्ही लवकर तृप्त होता.'ही तक्रार असे.ते स्वतः कधीही तृप्त झाले नाहीत.ते सातत्याने जगाकडे नव्यानं पाहत गेले आणि नवनिर्मिती करीत गेले.म्हणूनच ते म्हणू शकले, 'आताचा राग आणि कुमार इथेच संपला.उद्याचा राग व कुमार वेगळा असेल.'

एकंदरीत व्यक्ती व समाज हे सुसंस्कृत व प्रगल्भ होत जावेत,याचसाठी फ्रॉम,कृष्णमूर्ती,विनोबा,कुमारजी यांचा अट्टाहास होता.ते त्यांच्या मंथनातील नवनीत, आपल्या हातात आयतेच ठेवत गेले.त्यांचे मार्ग वेगवेगळे असले,तरी त्यांच्या विचारांतील सूत्र मात्र सारखेच होते. त्याची अधूनमधून उजळणी करताना 'माझे मज कळो येती अवगुण' ही तुकोबांनी सांगितलेली अवस्था येत राहते.स्वतःतील अपूर्णता नेहमी अस्वस्थ करीत राहते. तरीही ह्या ज्ञानियांच्या सान्निध्यात राहून स्व-क्षमतेनुसार काही शिकण्याचा प्रयत्न सुरू ठेवायचा.

■■■ क्रमशः ■■■


4/25/26

कोल्हा : एक धूर्त प्राणिविशेष / Fox: A cunning animal

कोल्ह्यासारखा लबाड आणि चतुर प्राणी नाही म्हणतात ते खरं असल्याची प्रचीती निदान त्याचं निरीक्षण करणाऱ्याला येते.त्याला शोधून कसं काढावं हाच मुळी प्रश्न पडतो.वर्षाच्या ठरावीक काळातच कोल्हा निश्चितपणे अमुक ठिकाणी सापडेल असं सांगता येत असलं,तरी तो मुक्त व स्वच्छंद प्राणी आहे.

कोल्ह्याची पिलं कप्पी व जमिनीतील पोखरीत बराच काळ राहतात.कित्येकदा ही लबाड बछडी कप्पीच्या समोर मे-जून महिन्यात खेळता-बागडतानाही दिसतात. वीण होताच कोल्ही त्यांना पाजवीत राखीत असते.जरा मोठी झाली की त्यांची मातापितरं त्यांना भक्ष्य आणून देतात.त्यांचं निरीक्षण करायचं तर विणीच्या काळात.

जुलै ते मार्च या प्रदीर्घ काळात कोल्ही कधी व कुठे दिसतील हे मात्र निश्चित सांगता येणार नाही. कोल्ह्यांच्या कप्पी व पोखरी शोधून काढणं ही देखील सोपी गोष्ट नाही.पोखरीच्या रचनेमुळे कोल्ह्याच्या वास्तव्याची खात्री झाली नाही,तर वासानं त्याच्या ठावठिकाणाची निश्चिती करता येते.कोल्ह्याच्या अंगाला कस्तुरीसारखा उग्र वास येतो.त्याच्या पोखरीत डोकावलं की तो तीक्ष्ण वास येताच कोल्होबा तिथे राहतात असं समजायचं.त्याचा वास इतका उग्र असतो की,कित्येक वेळा हा वास जमिनीवरूनही येतो.आपल्याकडे कोल्ह्याची पारध करण्याकरिता शिकवलेली जातिवंत कुत्री उपयोगात आणीत नाहीत. परंतु कुठल्याही पारध्याला विचारा,

त्यांची शिकारी कुत्री कोल्ह्याच्या वासाचा मागोवा घेत कशी पाठलाग करतात ते!

विचलित व भयभीत झालेल्या कोल्ह्याचा वास अधिक उग्र असतो असं म्हणतात.ज्या कोल्ह्याचा ससेमिरा करण्यात येतो तो चतुर कोल्हा जसजसा थकतो, तसतसा कमीकमी वास अंगातून सोडतो.भीती,राग, सजग व विचलितपणापासून मुक्त असलेल्या कोल्ह्याचाच परिचित वास येतो.

कोल्ह्याचं एकंदर वागणं पाहून मला नेहमी वाटत आलं आहे की,तो मनात म्हणत असेल :"भल्या गृहस्था,तुला माझा उग्र दर्प जवळून येत असेल,परंतु तुझा वास मात्र मला अर्ध्या मैलावरून येतो.आता यात घाणेरडा कोण हे तूच ठरव!"

कोल्ह्यानं आपला वास लपविण्याचा कितीही प्रयत्न केला तरी त्याच्या पाऊलखुणा एखाद्या स्पष्ट सहीसारख्या सराणीतील पवाट्यात,पोखरीजवळच्या मातीत उमटलेल्या दिसतात.पण इथे थोडं सावध राहायला हवं.कोल्ह्याच्या अन् कुत्र्याच्या पाऊलखुणांतील फरक ओळखणं कठीण असतं,

धनगराची अन् गुराख्याची कुत्री त्यांच्या बिळात उगीचच नाकं खुपशीत असतात आणि ह्याच कुत्र्यांच्या पाऊलखुणांमुळे कोल्ह्यांची पाऊलचिन्हं ओळखणं अवघड होतं.

स्वतःचा मागमूस लागू न देणाऱ्या ह्या कोल्ह्याचा ठावठिकाणा मात्र विणीच्या काळात त्यांच्या कप्पी पोखरींच्या तोंडाशी पडलेल्या खाद्याच्या अवशेषांवरून लागतो.कोल्ह्याची मादी जरा वेंधळीच असते.अन्नाचा सुकाळ असला की कप्पीच्या तोंडाजवळ पक्ष्यांचे पंख, पिसं,चोच,पंजे,हाडं,सशाची एखादी तंगडी इत्यादींचे अवशेष आढळून येतात.पाखरं,ससे, तसंच जंगलात हिंस्र पशुंनी मारून फस्त करून टाकलेल्या प्राण्यांच्या उरल्यासुरल्यातनं आणलेली मोठी हाडं इत्यादीमुळेही त्यांची कप्पी शोधून काढणं शक्य होतं.

एकदा तर मी एका कोल्ह्याच्या कप्पीजवळ ढाकाची (नर सांबर) मांसविरहित तंगडी,सशाचे पाय, रानकोंबड्यांच्या दोन चोची व तणमोराची पिसं पाहिली. पोखरीच्या तोंडात अडकलेल्या तणमोर व तित्तिराच्या पंखांचे अवशेष दिसले.प्राणिजगात धूर्त म्हणून प्रसिद्ध असलेल्या ह्या कोल्ह्यानं आपल्या अस्तित्वाच्या अशा खुणा ठेवाव्यात याबद्दल आश्चर्य वाटत असलं तरी निसर्गात असं सहज घडतं मात्र.जलाशयाकाठी कासवाची अंडी पिलं खाण्यासाठी कोल्ह्यांनी केलेल्या उगद्यांवरूनही (उकरलेले खड्डे) त्यांचं अस्तित्व कळून येतं.मांजराप्रमाणे तो आपली विष्ठा खळगा करून पुरत नसल्यामुळे विष्ठेचा मागोवा घेऊनही त्याचं एखाद्या ठिकाणातील अस्तित्व शोधून काढता येतं.

विणीच्या काळात कोल्ही दगडमातीच्या खाणीत, शेताच्या बांधाच्या पोखरीत (मोंगाड) आश्रयाला राहत असली तरी जंगलातून परंपरेनं चालत आलेली त्यांची कप्पी-पोखरींची स्थळं आढळून येतात.अशा ठिकाणी कोल्ही वर्षाकाठी वा काही वर्षांआड हमखास दिसतात. पारधी,शिकारी,धनगर,गुराखी व गायकी यांना कोल्ह्यांची निवासस्थानं असलेली अशी स्थळं ठाऊक असतात.परंतु कोल्हाही मोठा वस्ताद असतो.नित्य नवनवे निवारे,आश्रयस्थाने यांच्या शोधात तो असतो. एकदा मी जंगलातील उजाड पुलाखाली डोकावलो असता कोल्ही आपल्या लहानग्या बछड्याला पाजताना दिसली.

विणीच्या काळात पिलांसह त्यांचा ठाव घेणं मोठं कठीण असतं.कोल्हीला कुत्र्या-माणसाचा थोडा जरी वास आला तरी ती आपला निवारा सोडून पिलांसह निघून जाते.बिळासमोर नाचत-बागडत असलेली कोल्ह्याची गोजिरवाणी निष्पाप पिलावळ पाहणं मोठं मनोरंजक व आनंददायी असतं.'माणूस' नावाच्या शत्रूची अजून पुरती ओळख देखील झालेली नसते.रोज सकाळ-सायंकाळ पोखरीच्या तोंडालगत ती खेळताना दिसतात.मात्र मांजराच्या पावलानं त्यांना पाहावं लागतं. ती कितीही निष्पाप असली,तरी आपली चाहूल मात्र त्यांना लागू देऊ नये.निर्धास्त असलेली ही पिलं तांबडं फुटताच न्याहरीच्या वेळेपर्यंत बिळाच्या तोंडाजवळ खेळताना दिसत असली तरी त्यांना पाहणं तितकं सोपं नाही.पिलं जरी मूर्ख असली,तरी कोल्ही चतुरच असते.तिला काही सहज फसविता येणार नाही.पहाटेपूर्वीच्या काळोखात भक्ष्याच्या शोधात गेलेली कोल्ही दिवस उगवेपर्यंत पिलासाठी घास घेऊन परत येणार नाही,असं नव्हे.

कप्पीकडे येणारी कोल्ही तुम्ही कधी पाहिली आहे काय? गनिमी काव्याचे सारे पवित्रे घेत,नाकात सारा जीव आणून,शत्रूचा पावलागणिक वास घेत,पोखरीला वळसा घालीत मोठ्या सावधानतेनं ती घराकडे येते. तिच्या अद्‌भुत सहाव्या इंद्रियापासून काहीही लपून राहत नाही आणि म्हणूनच जमिनीवरून येणाऱ्या तुमच्या वासामुळे तिला तुमचा सुगावा लागू नये ह्यासाठी तुम्ही जमिनीपासून जरा उंचावरच जायला हवं.

कोल्ही तुम्हाला हेरील,तुम्ही जमिनीवर असताना हेरीलच.लगेच भुंकून ती आपल्या बछड्यांना सावध करील.पिलं इकडेतिकडे पाहण्यात क्षणाचाही वेळ न दवडता किंवा कसलंही कुतूहल न दाखविता लगेच बिळात धूम ठोकतील.त्या क्षणी त्यांना आलेला वास, पाहिलेलं दृश्य व आईचं विशिष्ट भुंकणं यांची सांगड घालून भविष्यात ती त्या वासाशी,दृश्याशी असलेलं धोक्याचं साहचर्य भुंकण्याशिवाय ओळखू शकतात,ती कायमचीच.

माणसाच्या आकाराशी,वासाशी परिचित झालेल्या मोठ्या पिलांचं आचरण प्रौढ कोल्ह्याप्रमाणेच असतं. पावसाळ्याच्या सुरवातीला ती खूप जाणती झालेली असतात.या काळात त्यांचं जमिनीवरून निरीक्षण करावयाचं तर दुर्बिणीतून दूर अंतरावरून किंवा जमिनीपासून उंचावरून.

तीन महिन्यांची मोठी पिलं मी रोज पहाटे चारच्या सुमारास अर्ध्या एक फर्लांगावरून पाहत असे.एकदा मात्र पाठमोऱ्या येणाऱ्या कोल्हीनं मला हेरलं.तशी तिनं पिलांना धोक्याची साद घातली.

व्यालेली कोल्ही सकाळ-सायंकाळ तिच्या पिलांबरोबर असताना थोडीफार दक्षता घेऊन तिचं निरीक्षण करता येणं सहज शक्य आहे.तुम्ही जरी जमिनीपासून पन्नाससाठ फूट उंचीवर असलात तरी अल्पशा हालचालीनं ती सावध होते.यापुढे तिथे राहणं तिला धोक्याचं वाटलं,तर लगेच ती आपलं बिन्हाड हलविते.

उंचावर बसलेल्या तुम्हास ती पाहू शकणार नाही.परंतु कुठल्याही प्रकारचा आवाज,हालचाल करण्याचं टाळणं अत्यंत आवश्यक असतं.लांबच्या अंतरावरून येणाऱ्या आवाजांची,हालचालींची ती कदाचित दखल देखील घेणार नाही.

तिच्या कप्पीपासून बारा फूट अंतरावर बसून,निश्चिंत मनानं बाहेर येणाऱ्या कोल्हीला मी काही वेळा पाहिलं आहे.परंतु अशा प्रकारची लगट वा जवळीक करण्यास मी तरी सांगणार नाही.

पोखरीसमोरच्या झाडाच्या किंवा शिलाखंडाच्या आश्रयाने,पाठमोरा वारा नसताना तुम्ही कदाचित तिला पाहू शकालही,पण ती चतुर कोल्ही कर्मधर्मसंयोगानं तुमच्या पाठीमागूनच आली तर !...तर पुन्हा त्या ठिकाणी ती कधीच दिसणार नाही; सहपरिवार ती तिथून लगेच निघून जाईल.

कोल्ह्याचं निरीक्षण करावयाचं तर पुढील नियम पाळायलाच हवेत.त्यांना दुरून पाहावं.दिवसाउजेडी उघड्या डोळ्यांनीच त्यांना पाहायचं झालं तर थोर्ड दूरवर गेल्यानं,जरा लांब अंतरावर राहिल्यानं काही बिघडणार नाही.उलट फायदाच होईल.त्यांच्यापासून वीसएक फुटांवर असण्यात खूप तोटे आहेत,तर पन्नास यार्डावर आपण मोठे सुरक्षित असतो.

कोल्ह्यीचं छायाचित्र मिळणं म्हणजे कपिलाषष्ठीचा योगच म्हणायला हवा!आपल्या आवाक्यातलं कप्पीजवळचं एखादं झाड,जवळपासची झाडंझुडपं यांच्या आश्रयानं तिचं एखादं छायाचित्र घेणं अशक्य नाही.कप्पीच्या तोंडाजवळ दिसणाऱ्या रिफ्लेक्टरमुळे ती कोल्ही अशी काही बुजून जाते की नंतर तिचं छायाचित्र मिळणं दुष्करच.कोल्ह्याचं छायाचित्र टिपता येणं हे आजही एक आव्हान आहे.

कोल्हा-कोल्ही आपल्या अजाण बछड्याची मोठ्या दक्षतेनं काळजी घेतात.खरोखरीच ती आदर्श मातापितरं असतात.वेळ पडली तर कोल्ही आपली पिलं वाचविण्यासाठी जिवाचा धोका पत्करेल.स्तनपान सोडलेली,आईविना असलेल्या पिलांची कोल्हा जोपासना करतो.त्यांना आईच्या मायेनं वाढवितो.

भक्ष्याविषयीच्या कोल्ह्याच्या काय सवयी आहेत त्याचं निरीक्षण सामान्यतःत्याच्या विष्ठेच्या पृथक्करणानं करता येतं.परंतु त्यांच्या कप्पीजवळ पडलेल्या पशुपक्ष्यांच्या अवशेषांवरूनही खूप माहिती मिळू शकते.दिवसाउजेडी तोंडात भक्ष्य धरून गुहेकडे येताना ते काय आणतात, यांच्याही नोंदी ठेवाव्यात.हेच निरीक्षण तांबडी काच असलेल्या विजेरीच्या साह्यानं रात्रीच्या वेळी गुहेच्या तोंडाजवळ करता येतं.कारण तांबड्या प्रकाशानं ते बुजत नाहीत.

निळावंती मारुती चितमपल्ली,साहित्य प्रसार केंद्र सिताबर्डी,नागपूर

त्यांच्या पोटातील अवशेषांवरून व विष्ठेच्या पृथक्करणानं मिळालेल्या माहितीवरून असं आढळून आलं आहे की,कोल्हे नाना प्रकारचं खाद्य खातात. गावकोंबड्या,तित्तिर,लावा व ससे यांवरच कोल्ही जगतात असं समजणं चुकीचं आहे,पण संधी मिळाली तर ते हे प्राणी सोडणार नाहीत,हेही तितकंच खरं आहे. घुशी,उंदीर,बेडकी,घुई,कोश-अळी,किडे,मृत प्राण्यांचं मांस हे त्यांचं मुख्य अन्न आहे.विविध फळंही त्यांना आवडतात.बहाव्याच्या गुळमट शेंगा त्यांना फार आवडतात.शेतातील ऊस,खरबूज,

कलिंगड,गाजर व रताळी ज्या ज्या वेळी सहज प्राप्त होतात,त्या त्या वेळी ते खातात.बोरं खाण्यासाठी ते बोराच्या झाडाखाली गोळा होतात.दूरदुरून अभयारण्यं पाहायला येणाऱ्या प्रवाशांना कोल्ही हमखास दाखविण्यासाठी वाघाप्रमाणे गारा (बेट : आमिषादाखल मुद्दाम मारून टाकलेलं जनावर) बांधावा लागतो.

सशाइतका उत्तम गारा नाही. परंतु सुकविलेलं मांस व अंडीही त्यांना आवडतात. एकदा का अशा गाऱ्याची सवय जडली की कोल्ही पुनःपुन्हा तिथे येताना दिसतात.

कधीकधी,कोल्ह्याला सहज चढता येईल अशा झाडावर 'गारा' बांधावा.कोल्ही अशा झाडांवर चढतात. कित्येकदा त्यात लपून बसलेलीही आढळतात.अशी संधी प्राप्त करून दिल्यामुळे त्यांना चढताना,उतरताना पाहता येणं सहज शक्य होतं.

जानेवारी-फेब्रुवारी हा त्यांचा विणीचा काळ.ज्या माळरानात कोल्हेकुई नेहमी ऐकू येते अशा जागेपासून काही अंतरावरच्या टेकडीवर चांदण्या रात्री बसलात तर कदाचित कोल्ह्याची एखादी जोडी दिसेलही.वाघानं टाकून दिलेल्या सांबराच्या अवशेषांवर कोल्ही मोठ्या संख्येनं जमा होतात.तुम्हाला शिकार आवडो न आवडो; पारधी,वैदू,शिलाजितवाले व आदिवासींची शिकारी कुत्री कोल्ह्यांचा माग काढताना जरूर पाहा;म्हणजे कोल्हा कुत्र्यांना कसा गुंगारा देतो कसा चकवतो ते दिसेल.असं एखादं शिकवलेलं कुत्रं जवळ बाळगलं तर कोल्ह्याचा माग काढायला त्याचा खूप उपयोग होतो.

एखाद्याला अचानक खूप लाभ झाला वा घबाड हाती लागलं तर अजूनही ग्रामीण भागात म्हटलं जातं की, "कोल्ह्याचं तोंड पाहिलंस की काय?" याचं कारण कोल्हा दृष्टीस पडण्याची संधी क्वचितच मिळते.एकदा मी वनमार्गानं जाताना दव पडलेल्या गवतावर उगवत्या सूर्याच्या प्रकाशात एक कोल्हा लोळताना दिसला. तळ्याच्या काठानं पक्षिनिरीक्षण करताना सराणीतल्या (नदीचं मागे सरलेलं खाडीसारखं पाणी) खोलगट भागातूनही त्याला बिचकून धूम ठोकताना अनेक वेळा पाहिलं.भावतरल मनाची माझी पहिली आठवण कशाची असेल,तर ती आहे समुद्रावरच्या मावळत्या सूर्याची दोन्ही बाजूला निळाईनं झाकलेल्या पर्वतमाला. मध्ये अथांग पसरलेल्या गूढ जलाशयावरच्या निळ्याहिख्या लाटा.सागर- सीमेवरील ते छोटंसं गाव. नारळ-पोफळी-केळी यांच्या सुंदर बागा.

किनाऱ्यावरचं ते केतकीचं बन आणि आपल्या पिलांबरोबर लपतछपत केवड्याच्या बनांतून डोकावणारी चतुर कोल्ही.


¶¶¶ समाप्त ¶¶¶

4/23/26

मीराबाई - आगळंवेगळं धाडस / Meerabai - extraordinary courage

कदाचित मेवाडच्या मीराबाईने आगीत उडी घेतली असती,तर पद्मावतसारखा तिच्यावरचा सिनेमा आला असता आणि मग एकविसाव्या शतकातील पुरुषांचा फौजफाटा तिच्या मानसन्मानाच्या रक्षणाच्या नावाखाली काचा फोडायला आणि सार्वजनिक मालमत्तेची नासधूस करायला रस्त्यावर उतरला असता.काल्पनिक सौंदर्यवतींनी आपल्या अंगावरील जडजड आभूषणे आणि वस्त्रप्रावरणे सावरत धाडस आणि अविचल धैर्याच्या गोष्टी बोलायच्या,त्या बोलताबोलता हसतमुखाने चितेत उडी घेऊन प्राणत्याग करायचा अशा भ्रममूलक गोष्टींमुळे पितृसत्ताक मर्दानी अभिमान जेवढा जागृत होतो तेवढा अन्य कशामुळेही होत नाही. त्यामुळे (बहुधा काल्पनिकच) पद्मावती 'योग्य तऱ्हेच्या दुःखी नायिकेने मरावं' त्या प्रकारे मरते पण खरीखुरी मीराबाई मात्र 'योग्य प्रकारे झुकण्यास नकार देऊन' पुरुषसत्तेसमोर एक समस्याच उभी करते.पती रणांगणावर मृत्यू पावल्यावर चितेवर चढण्याऐवजी मीराबाईनं ठामपणे जाहीर केलं की, मी सती जाणार नाही.त्याऐवजी लाडकं दैवत श्रीकृष्ण याच्या स्तुतीपर कवनं गात गात जगण्याचा पर्याय तिनं निवडला.

राजपूत समाजाच्या उग्र धर्मरक्षकांच्या दबावाला ती जराही बळी पडली नाही.नंतरच्या काळात पितृसत्तेने तिला स्त्रीरूपातली 'देवभक्तीची साक्षात मूर्ती' म्हणून स्वीकारलं असलं,तरी तिच्या स्वतःच्या काव्यात मात्र आपल्याला स्वेच्छेने वागणारी एक स्त्री दिसते.

जिनं मानसन्मानाच्या सगळ्या प्रस्थापित संकल्पना झुगारून दिल्या आणि भोवतीच्या प्रत्येकच मर्त्य मानवाचा अधिकारही झुगारून दिला.

सोळाव्या शतकाचं तांबडं फुटत असताना मीराबाईचा जन्म राजस्थानमधील मेरठ येथे झाला. प्रशंसकांनी लिहिलेल्या तिच्या संतचरित्रानुसार,ही मातृहीन कन्या आजोळच्या घरी लहानाची मोठी झाली.अगदी कोवळ्या वयापासूनच तिला कृष्णाबद्दल खूप प्रेम वाटत होतं.सन १५१६च्या सुमारास किशोरवय संपत असतानाच तिचा विवाह मेवाडचा विख्यात राणा संग याचा पुत्र भोजराज याच्याशी लावून देण्यात आला.तथापि,त्यांचे गुंतागुंतीचे वैवाहिक जीवन जास्त काळ टिकलं नाही.लग्नाला दहा वर्षं होण्यापूर्वीच मीराबाईचा नवरा वारला आणि राजघराण्यातील तिचं स्थानही डळमळलं.सती जाण्यास नकार दिल्यामुळे विधवापणामुळे आपोआपच मिळणारा दर्जाही नाहीसा झाला,परंतु त्रास देणारी स्त्री म्हणून आपली प्रतिमा निर्माण होत आहे,याची तिला तमा नव्हती.तिच्या एका अभंगात तिनं नवऱ्याच्या वारसाला उद्देशून म्हटलंय,"मला ही निंदा,हा कलंक मधुर वाटत आहे.मीरेचा प्रभु तर तो गिरिधर नागर आहे आणि दुष्टदुर्जनच भट्टीत जळणार आहेत." 

मीराबाईचं कृष्णावर उत्कट प्रेम होतं याबद्दल काहीच संशय नाही.तिच्या दैवी प्रियकराच्या विरहदुःखाविषयी तिनं रचलेली गीतं ही तिची महान गीतं समजली जातात.परंतु तिचा आवाज जगाला आव्हान देणारा आवाजही होता यातही काही संशय नाही.सासरचे लोक स्वतःची प्रतिष्ठा राखण्यासाठी आणि ती राजघराण्याची मर्यादा ओलांडते आहे म्हणून तिच्यावर बरीच बंधनं घालू इच्छित होते.परंतु मीराबाईने त्यांच्यापुढे मान तुकवायला नकार दिला.

मीराबाईच्या निधनानंतर लगेचच लिहिल्या गेलेल्या 'नभदास' यांच्या 'भक्तमल' ग्रंथात यातला काही प्रतिकार दिसून येतो.

त्यात हे संत लिहितात,"त्या गिरिधर कृष्णासाठी लोकलाज आणि कुलमर्यादा या दोन्ही गोष्टी मीराबाईने सोडून दिल्या होत्या. तिला कसलीही लाज आणि भीती उरलेली नव्हती. कुणाही समोर ती झुकत नव्हती.फक्त प्रेमाचा मृदंग वाजवत होती." वेगळ्या शब्दांत सांगायचं तर विधवेच्या पोशाखातलं कुणाच्याही समोर न येणारं जीवन जगण्यापासून मीरा दूर होती,तसंच ती पतिव्रतेच्या (म्हणजे पद्मावतीच्या) भूमिकेतही बसत नव्हती.

त्याऐवजी मीराबाई मोकळेपणानं अन्य भक्तांत वावरत होती आणि सहसा जिथं स्त्रियांना जायची परवानगी नव्हती,अशा ठिकाणी जात होती.एवढंच नव्हे;तर तिच्याशी संवाद साधणारे लोक वेगळ्याच प्रकारचे,वेगळ्याच पार्श्वभूमीतून आलेले होते.राजपूत विधवेचे आदर्श सोबती असं नक्कीच त्यांना म्हणता आलं नसतं.

समाजात तिनं तोंडही दाखवायचं नाही असं रूढी सांगत असताना मीराबाईने त्याच्या बरोब्बर विरुद्ध मार्ग निवडला त्यामुळे तिच्या कुटुंबाला अधिकच राग आला.तरीही तिला त्याची पर्वा नव्हती.ती त्याबद्दल म्हणते,"हे राणा,मला तुझी ही विचित्र दुनिया आवडतच नाही.या दुनियेत साधू कुणीच नाहीत,आहेत ते सगळे पाखंडी."


तिच्या या निर्धारामुळे तिच्यावर विषप्रयोग करण्याचाही प्रयत्न झाला,परंतु तरीही ती डगमगली नाही.तिनं आपल्या काव्यात म्हटलं,"राणा, साधुसंतांकडे जाण्यापासून मला कुणी रोखू शकत नाही.लोक काय म्हणतात याची मला पर्वा नाही." सरतेशेवटी,मीराबाईला सर्वांनी वाळीत टाकलं आणि त्यामुळे तिचा निर्धार अधिकच वाढला.


ती गाऊ लागली,"मूरख को तुम राज दियत हो, पंडित फिरत भिखारी." तर अन्य ठिकाणी ती म्हणते, "राणा रागावत असेल रागावू दे,त्याचं राज्य त्याला लखलाभ असो;पण देव रागावला तर मात्र मी कोमेजून जाईन."असं बोलून तिनं आपली निष्ठा कुठे आहे हे दर्शवलं.


ध्रुवदास लिहितात,"पायांत पैंजण आणि हातात चिपळ्या घेऊन ती नाचत होती.हृदयात विशुद्ध भक्ती घेऊन ती अन्य देवभक्तांना भेटत होती,तेव्हा तिला दुनियेचा क्षुद्रपणा कळत होता."तिला खूप काही गोष्टी सोडून द्याव्या लागणार होत्या.

परंतु हृदयाच्या हाकेला ओ देत तिनं ते सगळं तत्परतेने सोडून दिलं.मीराबाई लिहिते,"मी माझं सामाजिक शरीर त्यागलं,

शहरी शरीर त्यागलं,माझं कौटुंबिक शरीर त्यागलं,मला वारसाहक्काने मिळालेली सगळी आभूषणं त्यागली." केवळ कृष्णावरच सगळं चित्त लागल्याने प्रत्येक हानी तिनं घट्ट मनाने सोसली आणि ती लोकांच्यात मिसळून गेली.ती 'त्याची' गाणी गात होती आणि गाता गाता स्वतःचं स्वतंत्र अस्तित्वही राखत होती.


गणिका महात्मा आणि एक इटालियन ब्राह्मण, भारतीय इतिहासातील अज्ञात कहाण्या,मनू.एस.पिल्लई,अनुवाद सविता दामले,मधुश्री पब्लिकेशन


हळूहळू मीराबाई 'प्रवासी संत' बनली.एके काळी जी राजाची राणी होती तिथंच आज ती बहिष्कृता बनली.तिच्या सत्संगाला हजेरी लावणारे लोक बरेच होते;परंतु तिचा मार्ग हलाखी आणि सत्त्वपरीक्षांनी भरलेला होता.भक्तिपरंपरेतील काही लोक तिला आव्हान देत होते किंवा या स्वच्छंद स्त्रीचा फायदा घेण्याचाही प्रयत्न करत होते.पण ती त्यांनाही पुरून उरली.द्वारका येथे त्या शतकाच्या मध्यावर मरतानाही ती स्वतःच्या अटीवर मेली.(दुसऱ्यांच्या इच्छेने पती-चितेवर जळून नव्हे) तिच्या कहाणीने नंतर बऱ्याच लोकांना भारावून टाकलं. महात्मा गांधींना तिच्यात अहिंसक प्रतिकाराचं उदाहरण दिसलं,तर कर्नाटक संगीत गायिका एम. एस.

सुब्बलक्ष्मींनी मीराबाईची धार्मिकता चित्रपटीय पडद्यावर आणली.परंतु त्याचसोबत कुटुंब,विवाह, जात,घराणे,राजपद आणि अगदी भक्तिमार्ग यांच्यासारख्या सामर्थ्यशाली आणि खोलवर रुजलेल्या संस्थांशी संबंधित मूल्यंही मीराबाईने स्वीकारली नाहीत,मानली नाहीत आणि धुडकावून लावली,

हेही तितकंच महत्त्वाचं आहे.तिनं प्रत्येक ठिकाणाहून लादण्यात आलेलं अपेक्षांचं ओझं झुगारून दिलं आणि तिला देवाजवळ घेऊन जाणारं जे जे काही होतं तेच कष्टपूर्वक कवटाळलं. उत्कटता,दोष,नाकारलेपणाची भावना आणि महानता या सगळ्या सगळ्या गोष्टी याही मर्त्य जीवात गुंफलेल्या होत्या तरीही 'मेवाडची मीराबाई' या मनमोहक,

अमर नावाने ती आजमितीलाही स्मरली जाते आहे.


अशा प्रकारे,खरोखरच ती जशी होती,तशीच ती जगली आणि तशीच ती मेली.तिनं त्या एकरंगी पावित्र्याची खाण म्हणून गणल्या गेलेल्या काल्पनिक पद्मावतीच्या पावलांवर पाऊल टाकून दुसरी पद्मावती बनायला नकार दिला.


■■■ समाप्त ■■■



4/21/26

रंगीची गोष्ट / A colorful thing

रंगी ह्या खोलीत पहिल्यांदाच आली होती.तिने आजूबाजूला पाहिलं.एका बाजूला कालीमातेची भव्य मूर्ती,दुसऱ्या बाजूला त्रिशूल,कवटी आणि काही हाडं मांडून ठेवलेली होती.रंगीचं अंग थरथरलं.तिने परत बाबांकडे पाहिलं.बाबा आता हवेत कुणाशी बोलत असल्यासारखे हातवारे करत होते.मध्येच नमस्कार करत होते.सुरुवातीला एकदा तर त्यांनी लोटांगणही घातलं होतं.सुमारे वीसेक मिनिटांनी बाबा शांत झाले. पुढची पाच मिनिटं तसेच डोळे मिटून बसले.मग सावकाश डोळे उघडून खोल आणि धीरगंभीर आवाजात बाबा म्हणाले,

"कालीला रक्त हवंय.ताजं रक्त.मानवी रक्त.लहान मुलाचं रक्त !"

बाबांचा एक एक शब्द खोल गुहेतून आल्यासारखा वाटत होता.रंगीच्या अंगावर सरसरून काटा आला.ती घाबऱ्या आवाजात म्हणाली,"बाबा,पण लहान मुलाचं रक्त मी कुठून आणायचं ?"

बाबांचं रूप पालटलं,ते कडाडले."धन तुला हवंय.मला नाही! नरबली कालीला हवा आहे.ही तिची मागणी आहे.तुला ती मी फक्त सांगितली.काय करायचं ते तुझं तू ठरवायचं आहे.आता तू जा.तुझा विचार झाला तरच उद्या ये.नाही तर धन विसर.मठीत पुन्हा येऊ नकोस."

रंगी चावी दिलेल्या बाहुलीसारखी मठीच्या बाहेर पडली. घरापर्यंत कशी आली ते तिचं तिलाही कळलं नाही. तिच्या मनाला एकप्रकारची बधिरता आली होती.आज कामावर जायचं नाही असं ठरवून ती तरटावर आडवी झाली.थोड्याच वेळात तिचं स्थळकाळाचं भान गेलं. तिला सणसणून ताप भरला.ती कण्डू लागली.रंगीला जाग आली तेव्हा करकरीत संध्याकाळ झाली होती.जराशाने तिने उठून पाहिलं तर खोलीत आणि अंगणातही काळाकुट्ट अंधार होता.आता तिचा ताप उतरलेला होता.सगळं अंग घामाने डबडबलेलं होतं. खूप अशक्तपणा तिला जाणवत होता.तिच्या कानात भैरवनाथबाबांचे शब्द घुमत होते.

"कालीला रक्त हवंय.ताजं रक्त.मानवी रक्त.लहान मुलाचं रक्त !"

तिने त्याच तंद्रीत दिवा लावला.आईने खोलीत दिवा लावलेला पाहिल्यावर बाहेर खेळत असलेला छोट्या घरात आला.आईला बिलगला.त्याला जवळ घेताना रंगीच्या मनात एक विचार चमकून गेला,त्यासरशी तिची तीच दचकली ! 'नाही! नाही!' असं काहीसं पुटपुटत ती मान हलवत राहिली.पण थोड्या वेळाने तिचे डोळे चमकले.तिच्या मनातला गोंधळ संपला होता.तिने पर्याय निवडला.तिला श्रीमंत व्हायचं होतं. तिचा निर्धार झाला. तिने छोट्याला आपल्यापासून दूर केलं.

भैरवनाथबाबांना होकार देताना रंगीच्या मनात शंका होती.ती तिने बोलून दाखवली."महाराज,माझ्या छोट्याला मी कालीमातेला देते आहे पण त्याला त्रास व्हायला नको."

भैरवनाथबाबा गंभीरपणे म्हणाले,"नागेश तुझ्याकडे येऊन मुलगा कालीला विधिवत् अर्पण करील.त्यानंतर पुढचं काली सगळं बघून घेईल.तिला चढवलेला भोगदेखील तुझ्या घरातून तीच नेईल आणि तुझ्या घरात धनदेखील तीच आणील."

रंगीच्या मनातल्या सगळ्या शंका बाबांच्या बोलण्याने फिटल्या.

बाबा पुढे म्हणाले,"योगायोगाने उद्याच अमावस्या आहे.नागेश संध्याकाळीच तुझ्याकडे येईल. मध्यरात्रीपर्यंत पूजाविधी पूर्ण करील.कालीला तिचं भक्ष्य अर्पण करील.'

मठीतून निघताना नागेशने पूजेसाठी काय काय सामान आणून ठेवायचं त्याची यादी रंगीकडे दिली.बाकीचं लागणारं सामान तो स्वतः येताना घेऊन येणार होता.

दुसऱ्या दिवशी संध्याकाळीच नागेश रंगीच्या घरात शिरला,त्याबरोबर रंगीने घाईघाईने खोलीचं दार आतून लावून घेतलं.नागेशने गोड बोलून छोट्याला अफूमिश्रित पेढे खायला दिले.

पहिल्यांदाच असा खाऊ त्याला कुणी देत होतं.आग्रहाने खाऊ घालत होतं.छोट्याही आनंदाने ते पेढे खाऊ लागला.थोड्याच वेळात त्याला गुंगी येऊ लागली आणि तो अर्धबेशुद्धावस्थेत गेला.आता नागेश भराभर कामाला लागला.छोट्याच्या डोक्यावरचे सगळे केस त्याने तासून टाकले.त्याला स्वच्छ आंघोळ घालून नंतर काळ्या रंगाची लंगोटी बांधली.त्याच्या कपाळावर कुंकवाचा मळवट भरला.टाळूवर अगम्य अशा आकृत्या शेंदराने काढल्या.हे करत असताना एकीकडे काही तरी मंत्र तो जोरजोरात म्हणत होता.गळ्यात कवड्यांची माळ घालून,केस मोकळे सोडून,कपाळावर मळवट भरून बसलेली रंगी नागेश सांगेल ती मदत त्याला करत होती.नागेशने खोलीच्या चारी कोपऱ्यांत धूप लावला होता.त्यामुळे खोलीचं वातावरण पार बदलून गेलं होतं. छोट्या मात्र अर्धवट डोळे मिटलेल्या अवस्थेत सगळे सोपस्कार करून घेत होता.त्याला जास्तच झापड आली की,नागेश त्याच्या चेहऱ्यावर हळुवार हाताने थोपटत त्याला जागं ठेवत होता.

नागेशने रंगीने केलेल्या भाताच्या मुदी केल्या.त्यांच्यावर कुंकू,काळे तीळ वगैरे गोष्टी टाकल्या.आता मंत्र म्हणण्याचा त्याचा वेग खूपच वाढला होता आणि हालचालींनाही प्रचंड वेग आला होता.शेवटी त्याने त्याच्या छाटीतून एक छोटं पण अत्यंत तीक्ष्ण असं त्रिशूल काढलं आणि डोळ्याचं पातं लवतं न लवतं तोच छोट्याच्या गळ्यावरून फिरवलं.एक पुसटशी रक्ताची रेघ छोट्याच्या गळ्यावर दिसायला लागली,त्याच लालसर झालेल्या त्रिशूळाने नागेशने भाताच्या मुदींवर त्वेषाने प्रहार केले आणि त्या विस्कटून टाकल्या.आता विधी संपला होता.नागेश घामाने चिंब भिजला होता. छोट्याही श्रमाने आणि गुंगीने आडवा झाला.नागेशने सगळी पूजा एका केळीच्या पानात गोळा केली.रंगीला ते बोचकं गावाबाहेर चौफुल्यावर ठेवायला सांगून तो नेहमीसारखा अंधारात अदृश्य झाला.

आता खोलीत धुपाचा वास,कालीमातेचा फोटो आणि त्यासमोर आडवी ठेवलेली दोन मानवी हाडं एवढंच शिल्लक होतं.रंगीने सुटकेचा निःश्वास सोडला. छोट्याला तसाच झोपलेला ठेवून ते बोचकं घेऊन ती चौफुल्याच्या दिशेने निघाली.बाबूला तिने आज होटेलातच झोप म्हणून सांगितलं होतं.पुढचे पंधरा दिवस गळ्यावरची जखम मिटेस्तोवर आणि डोक्यावर केस येईपर्यंत छोट्याला शाळेतच काय पण घराबाहेरही ती जाऊ देणार नव्हती.जाताना नागेशने एक अफूची पुडी छोट्याला रोज देण्यासाठी म्हणून देऊन ठेवली होती.त्याच्या अमलाखाली पंधरा दिवस तो घरातच गुंगून पडणार होता.आता नागेशचं काम संपलं होतं.आता कालीमाता स्वतःचं काम स्वतःच करील असं त्याने सांगितलं होतं. रंगीला फक्त काही विधी करायचे होते नि मंत्र म्हणायचे होते.त्याने सांगितल्याप्रमाणे दररोज रात्री रंगीच्या खोलीतून हळू आवाजात मंत्राचे आवाज येऊ लागले. त्याची दबक्या आवाजात चर्चा व्हायला लागली.छोट्या पंधरा दिवसांनी घराबाहेर खेळायला म्हणून आला तेव्हा त्याचं एकंदर रूप आणि गळ्यावरची अस्पष्ट अशी खूण बघून लोकांच्या मनात शंकेची पाल चुकचुकायला लागली.त्यातच दर शनिवारी मध्यरात्रीची केस मोकळे सोडलेली एक बाई गल्लीतल्या पिंपळाला फेऱ्या मारते अशी अफवा पसरली.गल्लीतले लोक बाहेर ओट्यावर झोपायला घाबरू लागले.अशाच अवस्थेत दोन महिने गेले.छोट्या हळूहळू खंगू लागला.अशक्त दिसू लागला. गल्लीतल्या भीतीने 'जयजवान मंडळा'च्या स्वयंसेवकांनी गल्लीत गस्त बसवली.

एका शनिवारी दिलीप आणि इतर स्वयंसेवकांना दुरून एक आकृती पिंपळाजवळ दिसली.पण ते धावत तिथे पोहचेपर्यंत ती आकृती नाहीशी झाली होती.तिथे उमटलेल्या ओल्या पावलांच्या ठशांचा वेध घेत ते गेले तर ते ठसे रंगीच्या खोलीपर्यंत जाऊन घांबले होते. दिलीपने दार ठोठावलं.पाचदहा मिनिटं ठोठावूनही दार उघडलं गेलं नाही.नंतर डोळे चोळत चोळत रंगीने दार उघडलं.दिलीप जबरदस्तीने आत घुसला.मोरीत पडलेलं ओलं लुगडं,कोपऱ्यात कालीचा फोटो,त्यासमोरची मानवी हार्ड आणि धुपाचा दरवळ ... दिलीपने रंगीकडे संशयाने रोखून पाहिलं.

"रंगूबाई,हे सगळं थांबवा.परत आम्हाला काही संशयास्पद प्रकार दिसला तर आम्ही सरळ बापूसाहेबांच्याकडे तक्रार करू!"

रात्रभर रंगीला झोप आली नाही.धन मिळेल तेव्हा मिळेल.पण राहतं घर जाण्याची वेळ आता आली होती. नागेशने या व्रता-विधीच्या गोष्टी किती दिवस करायच्या हे सांगितलं नव्हतं आणि आता हे बापूसाहेबांना कळलं तर डोक्यावरचं छप्पर जाईल.

रस्त्यावर यावं लागेल.तसं झालं तर मग काय करायचं? कोण आसरा देईल आपल्याला ? कामंसुद्धा सुटतील. खाणार काय ? छोट्याला शिकवणार कुठल्या जोरावर ? ते काही नाही. हे आता थांबवलंच पाहिजे.दुसऱ्या दिवशी तिने माईंना भेटायचं ठरवलं.रंगीच्या मनातली खळबळ शांत झाली.

सकाळची सगळी कामं आटोपून माई दहाच्या सुमारास गोठ्यात असतात तेव्हाची वेळ त्यांच्याशी बोलायला बरी असं तिला वाटलं.

माई नेहमीप्रमाणे पार्वती-लक्ष्मी आणि नंद्याचं चारापाणी बघत असताना मागचा दरवाजा उघडून कुणीतरी आत आल्याचा आवाज त्यांना आला.माई मागे मान वळवून बघणार तोच तिन्ही जनावरं हंबरू लागली.दावं तोडायला लागली.एवढंच काय,

घाबरून जवळ येणाऱ्या नंद्याला लक्ष्मी शिंगांनी दूर ढकलायला लागली.माईंनी वळून पाहिलं तर दरवाजात रंगी उभी होती!

माईंना रंगीविषयी काही कुणकुण लागली होती.त्यामुळे त्या तिला म्हणाल्या,"रंगे,बरं झालं तूच स्वतःहून आलीस.मी तुला बोलावणारच होते."

माईंचं बोलणं ऐकताच रंगीने हंबरडा फोडला.स्वतःचं पायतण काढून तोंड झोडून घेऊ लागली.माई म्हणाल्या,"हे बघ,तू पुढच्या दरवाजाने येऊन चौकात थांब.मी गुरांना शांत करून येते.तू येताच ही निष्पाप जनावरंपण इतकी अस्वस्थ झाली आहेत की,लक्ष्मी तिच्या गोऱ्हालाही जवळ येऊ न देता शिंगांनी ढकलतेय.जा बरं तू."

गुरांना थोपटून शांत केल्यावर माई चौकात आल्या.रंगी कोपऱ्यात मान खाली घालून उभी होती.तिने रडत रडत सगळी हकिकत सांगितली. ती ऐकून माई थक्कच झाल्या.त्यांच्या कल्पनेपलीकडचं त्यांच्याच मालकीच्या खोलीत घडत होतं अन् त्याचा त्यांना पत्तादेखील नव्हता!माईंना रंगीच्या लोभी स्वभावाचा राग आला आणि कणवही आली.

रंगीला समजावत त्या म्हणाल्या,"रंगे,तुझ्या बाबाने धन मिळेल म्हणून सांगितलं पण किती ते नाही सांगितलं.उद्या एखादा रुपया मिळाला तर ते धनच म्हणायचं.आणि बळदात तेवढंच असणार.आमच्याकडे वाडा आला तेव्हा तो सावकाराकडे गहाण पडला होता.मी घरातलं सोनं विकून तो सोडवला.

तेव्हा बळदात ठेवायला पैसे कुणाकडे असणार होते ? आणि त्या नसलेल्या धनाच्या लोभापायी तू आपला सोन्यासारखा मुलगा बळी देणार होतीस? अगं,आई आहेस की कसाई?"

रंगी माईंच्या पायावर गडबडा लोळायला लागली. माई म्हणाल्या,

"आता फार नाटक करू नकोस.उद्यापासून छोट्यासाठी वाड्यावरून रोज अर्धा शेर दूध पुढचे तीन महिने घेऊन जा आणि आधी तो फोटो अन् ती हाडंबिडं आजच्या आज घराबाहेर काढून गावाबाहेर त्याचा निकाल लावून टाक !"

तीन महिन्यांनतर छोट्या आता छान गुटगुटीत आणि तजेलदार दिसत होता.एके दिवशी माई सकाळी नेहमीप्रमाणे गोठ्यात होत्या तेव्हा रंगी छोट्याला घेऊन आली.तिला पाहून आज लक्ष्मी बिथरली नाही.नंद्यानेही गोंधळ घातला नाही.

छोट्या माईंना नमस्कार करून म्हणाला,"आजी,शाळेत माझा पहिला नंबर आलाय!"

माईंनी त्याच्याकडे कौतुकाने पाहिलं.कनवटीचा एक रुपया काढून त्याच्या हातावर बक्षीस म्हणून ठेवला. छोट्याला खूपच आनंद झाला. रंगीच्याही चेहऱ्यावर समाधान होतं. ती दोघं गेल्यावर माईंनी वळून पाहिलं तर लक्ष्मी नंद्याला वात्सल्याने चाटत होती.

●●● समाप्त ●●●

4/19/26

रंगीची गोष्ट / A colorful thing

बाबूची आई धाकट्या छोट्याला शाळेत नाव घालायला आलेली पाहून चष्म्याच्या वरच्या भागातून रोखून बघत अनुनासिक स्वरात त्यांनी विचारलं, "जन्माचा दाखला कुठाय?"

मागील लेखातून पुढे…

रंगीने पिशवीत जपून ठेवलेला दाखला बाहेर काढला.दाखल्याकडे निरखून बघत गुरुजींनी ड्रॉवरमधून रजिस्टर काढलं.त्यातलं बाबूचं नाव मनातच वाचलं. नंतर रंगीकडे रोखून बघत तीक्ष्ण स्वरात म्हणाले, "दोघांच्या आडनावांत फरक कसा?"

रंगीला उत्तर न सापडल्याने तिने न बोलता मान खाली घातली.जोशीमास्तरांनी किरट्या आवाजात म्हटलं, "अशा परिस्थितीत ह्या मुलाला शाळेत भरती करता येणार नाही!"

रंगी गोरीमोरी झाली.छोट्याचा हात धरून घरी परत आली.जाताना छोट्याने सगळ्या गल्लीत 'साळेमंदी नाव घालाया चाललो'असा गाजावाजा केला होता.त्यामुळे हिरमुसला झालेल्या छोट्याला बघून गल्लीत सगळ्यांना शाळेत घडलेली घटना समजली.दोनतीन दिवस गल्लीत सगळ्या घरात नि मारुतीच्या पारावर छोट्याची शाळेतली अ‍ॅडमिशन आणि जोशी गुरुजींचा आगाऊपणा ह्यावर चर्चा चालू होती.तिसऱ्या दिवशी सकाळीच 'जयजवान मंडळा' ची मुलं वाड्यावर बापूंना भेटायला आली.बापूंच्या कानावरदेखील छोट्याच्या शाळेतील अ‍ॅडमिशनचा प्रकार आला होता.जयजयवानचा आक्रमक अध्यक्ष दिलीप ह्याने बापूंना यासंबंधी काही नियम,काही कायदा आहे का,जोशीमास्तर अशा कारणांनी छोट्याची अ‍ॅडमिशन नाकारू शकतात का,हे विचारून घेतलं.

बापू त्याला म्हणाले,"दिलीप,तिथे जाऊन भांडूबिंडू नकोस ! जोशींना म्हणावं,तुम्ही छोट्याला भरती का करत नाही,त्याची कारणं लेखी द्या.त्यांनी काही लिहून नाही दिलं तर त्यांना सांग,मी भेटायला येणार आहे."

दिलीप आणि जयजवानचे इतर सभासद छोट्याला घेऊन शाळेत गेले."छोट्याला भरती करा नाही तर तसं लेखी द्या आणि अ‍ॅडमिशन नाही दिली तर बापूसाहेब तुम्हाला भेटायला येणार आहेत !"

दररोज संध्याकाळी तालमीत दोन दोन तास कसरत करणाऱ्या त्या मंडळींकडे चष्याच्या वरच्या भागातून बघत गुरुजी नरमाईने म्हणाले,"एवढ्या लहानशा गोष्टीसाठी बापूसाहेबांना कशाला तसदी दिलीत ? उद्यापासून छोट्याला शाळेत पाठवून द्या."

"उद्यापासून कशाला ? छोट्याला बरोबरच आणलं आहे.कुठल्या वर्गात बसवू ते सांगा."

गुरुजींनी दाखवलेल्या दिशेने छोट्याला घेऊन दिलीप आणि बाकी सभासद निघाले.छोट्या तर उड्याच मारत निघाला.जोशी गुरुजींनी रजिस्टर काढून छोट्याच्या नावाची रीतसर नोंद करायला सुरुवात केली.

छोट्याची शाळा सुरू झाली.तो अभ्यासात रमलादेखील पण एक अनपेक्षित अडचण समोर आली.छोट्याला शाळेत घालेपर्यंत गल्लीत गावात कुणालाच त्याच्या आणि बाबूच्या वडिलांच्या नावात-आडनावात फरक आहे हे माहीत असण्याचं कारण नव्हतं.पण छोट्याच्या अ‍ॅडमिशनच्या वेळी मुख्यत्वे जोशीगुरुजींनी हरकत घेतल्यामुळे ते सगळ्यांनाच कळलं होतं.शाळेतली सगळी मुलं येता-जाता दोघांना त्यातल्या त्यात बाबू मोठा असल्याने त्याला चिडवायला लागली.छोट्या लहान होता.त्यामुळे त्याला मुलं कमी चिडवत.शिवाय त्याचा अर्थही त्याला फारसा कळत नव्हता पण बाबूच्या आणि त्याला चिडवणाऱ्या त्या मुलांच्या मारामाऱ्या होऊ लागल्या.त्यापैकी काही कागाळ्या मास्तरांपर्यंत जायच्या.छोट्याच्या अ‍ॅडमिशनच्या वेळी जबरदस्ती केल्याने जोशी मास्तर दुखावले गेले होते.त्याचा राग ते बाबूवर काढायचे आणि त्याला कडक शिक्षा करायचे. आधीच बाबूला अभ्यासात फारसा रस नव्हता.त्यात मुलांचं चिडवणं अन् वरून मास्तरांचा मार.ह्या सगळ्यामुळे बाबूने शाळेत जाणंच बंद केलं.

शाळेत न जाण्याचं कारण रंगीला समजल्यावर ती बाबूला काहीच बोलू शकली नाही.तिने श्रीकृष्ण टॉकीजच्या जवळच्या 'दी नागपुरे टी अँड स्नॅक्स'मध्ये बाब्याला नोकरीला लावून दिलं.बाब्यालादेखील हे काम आवडलं.तो ढोरमेहनत करायला मागेपुढे बघायचा नाही.त्यामुळे होटेलचा मालक जगदीशभाई नागपुरे पण त्याच्यावर खूश असायचा.बाबू पगाराचे सगळेच्या सगळे पैसे आईच्या हातात आणून द्यायचा.त्यामुळे रंगीसुद्धा त्याच्यावर खूश होती.पैसे कमवून संसाराला हातभार लावणारा म्हणून रंगी आता बाबूला जीव लावू लागली.थोड्या दिवसांतच बाबू आणि छोट्याच्या वेगवेगळ्या नावा-आडनावांच्या प्रकरणाचा लोकांना विसर पडला.चिडवणं बंद झालं.छोट्याची शाळा सुरळीत चालू झाली होती आणि बाबूचा पगार नियमित येत होता.त्यामुळे रंगीच्या संसाराच्या गाड्याला वंगण मिळून तो आवाज न करता चालू लागला.गल्लीतल्या शंकराच्या देवळात एक दिवस अचानक एक साधू आला.त्याच्याबरोबर त्याचे दोन शिष्यदेखील होते.

सुरुवातीचे आठ दिवस बाबांचं मौनव्रत होतं.पण देवळात येणाऱ्या लोकांना शिष्यांकडून बाबांची माहिती मिळत होती.बाबांचं नाव भोलेनाथबाबा होतं. हिमालयात पंचवीस वर्षं एका पायावर उभं राहून त्यांनी तप केलं होतं...! सध्या जरी ते जेमतेम चाळिशीचे दिसत असले तरी त्यांचं वय शंभरीच्या जवळपास आहे...! लहानशा गावाला चघळायला नवा विषय मिळाला.बाबांचं मौन संपेपर्यंत त्यांच्याभोवती भक्तांचा घोळका जमला.त्यात स्त्रिया प्रामुख्याने होत्या,सगळ्या जणी रात्री भजनाला जमायच्या.

'चांग फिटला,पांग फिटला,भोलेनाथबाबा मला गुरू भेटला'

अशासारख्या भजनांचे आवाज गल्लीत घुमू लागले. रंगीसुद्धा नियमित जाणाऱ्या भक्तांपैकी एक झाली. शिष्यांनी भक्तांना भोलेनाथबाबांचे फोटो वाटले.इतर भक्तांप्रमाणे रंगीच्याही घरात फ्रेम लावलेला भोलेनाथबाबांचा फोटो लागला.त्याला उदबत्ती लावणंही सुरू झालं.गल्लीतल्या प्रतिष्ठित घरातल्या बायका कुजबुजायच्या - 'करून करून भागली नि देवपूजेला लागली...'

माईंकडे कुणी तरी हा विषय काढला तर त्या म्हणाल्या, “भोलेनाथबाबांबद्दल मला माहीत नाही पण त्यांच्या निमित्ताने रंगी भक्तिमार्गाला लागलीय,हे चांगलंय. भजन,कीर्तनाच्या नावाने चार चांगले शब्द कानांवर पडताहेत,मुखातून बाहेर पडताहेत,हेदेखील चांगलंच आहे!" चारेक महिन्यात भोलेनाथबाबांचा मुक्काम हलला पण तोपर्यंत रंगीच्या मनात त्या तथाकथित बाबाच्या भक्तिमार्गाची वाट चांगलीच रुळली होती. तिच्या त्या भक्तीला प्रत्यक्ष स्वरूप देणारं कोणी नसल्याने ती सैरभैर झाली आणि ह्या अस्वस्थतेच्या काळातच तिला अनकाईच्या डोंगराजवळ राहणाऱ्या अघोरी पंथाच्या भैरवनाथांचं नाव समजलं.रंगी एकदोनदा तिथे जाऊनही आली आणि मग त्यांच्या नादीच लागली.बाबांना भूत-भविष्य चांगलं समजतं... ते थेट कालीमातेशी बोलू शकतात... वगैरे गोष्टी ती भांडी घासायला ज्या ज्या घरी जायची त्या त्या घरांत सांगायची.तिच्या घरातला भोलेनाथबाबांचा फोटो जाऊन आता भैरवनाथबाबांचा फोटो आला. संध्याकाळी त्यांच्या फोटोसमोर धूप लागू लागला. संध्याकाळी महाराजांनी प्रसाद म्हणून दिलेली कवड्यांची माळ रात्रीच्या पूजेच्या वेळी रंगीच्या गळ्यात दिसू लागली.एकदा मठीतून येताना रंगीने भैरवनाथांच्या भजनाची पुस्तकं आणली आणि रात्री ती एकटीच त्यांची भजनं म्हणायला लागली.कधी कधी ती छोट्यालाही आपल्याबरोबर भजनं म्हणायला लावायची.बाबू रात्रीचा सिनेमा सुटल्यावर घरी यायचा म्हणून तो कधी भजनाला नसायचा.हळूहळू रंगीवर भैरवनाथांचा पगडा वाढत गेला.तशा तिच्या मठीच्या फेऱ्याही वाढत गेल्या.

एकदा रंगी मठीत गेली असताना बाबांनी एरवी नेहमी बंद असलेले

डोळे उघडले आणि आपली तीक्ष्ण नजर रंगीवर रोखून ते म्हणाले,

"बेटा,तुझ्या नशिबात भरपूर धनलाभ आहे!"

इतक्या दिवसांत बाबा प्रथमच तिच्याशी बोलले होते.बाबांचं भविष्य रंगीला अशक्य वाटलं.लोकांच्या घरची भांडी घासून आणि पोराने होटेलात काम करून घरी येणारा पैसा म्हणजे धनलाभ असू शकत नाही,एवढं कळण्याइतकी रंगी हुशार होती.रंगीच्या चेहऱ्यावरून आपण सांगितलेल्या भविष्यावर तिचा विश्वास बसला नाही हे चाणाक्ष बाबांनी ओळखलं.

त्यांनी आपल्या पट्टशिष्याकडे निर्देश करत म्हटलं,

"धन कुठून येणार अन् कसं येणार हे हा तुला समजावून सांगेल.त्यासाठी मधूनमधून हा तुझ्या घरी येईल."

बाबांच्या बोलण्यातल्या ठामपणाने भरपूर पैसा मिळण्याची शक्यता आहे असा विश्वास रंगीला वाटला आणि तिचे डोळे चमकले !

बाबांच्या सांगण्याप्रमाणे नागोजी रंगीच्या खोलीवर आला आणि नंतर यायलाच लागला.पहिल्या फेरीतच त्याची घारीसारखी नजर सगळ्या गल्लीवर,वाड्यावर अन् रंगीच्या खोलीत भिरभिरली.दीर्घ श्वास घेत नागोजी म्हणाला,

"येतोय... येतोय... येतोय... पैशांचा आवाज येतोय आणि वासपण येतोय.रंगूबाई,सोन्याची नाणी,चांदी, हिरे-माणकं मोडूंच घबाड दिसतंय.आता फक्त ते कुठे आहे,कसं मिळवायचं,एवढंच बघणं आपलं काम आहे."

नागोजी दिवेलागणीच्या सुमारास यायचा.रंगीच्या खोलीत डोळे मिटून ध्यानधारणा करायचा.भजनाचा कार्यक्रम झाला की,रात्रीच्या अंधारात नाहीसा व्हायचा. काळाकुळकुळीत,कपाळावर शेंदूर फासलेला, कवड्यांच्या आणि वेगवेगळ्या रंगांच्या मण्यांच्या माळा घातलेला,कुरळ्या केसांचं जंगल असलेला फेफट्या नाकाचा नागोजी अतिशय भयानक दिसायचा. बोलताना आपली लांबलचक अन् टोकदार जीभ बाहेर काढून ओठांवर फिरवायची त्याला सवय होती.नागोजी रंगीकडे आला की,त्याला पाहायला गल्लीतली पोरंटोरं आणि कधी कधी मोठी माणसंसुद्धा मुद्दाम खोलीवरून सहज आल्यासारखी आत डोकवायची.पाचसहा भेटींनंतर नागोजी येऊन जेव्हा डोळे मिटून ध्यान करत बसला होता आणि रंगी त्याच्यासमोर हात जोडून भैरवनाथबाबांचा जप करत होती तेव्हा अचानक नागोजीने डोळे उघडले.विस्फारलेल्या डोळ्यांनी तो रंगीला म्हणाला,"सापडलं ! मला सापडलं ! मी प्रत्यक्ष पाहिलं ! दोन हंडे भरून ठेवले आहेत !! जमिनीखालच्या जागेत आहेत. ्इथून फक्त पाचशे फुटांवर आहेत!"

रंगीचं हृदय जोरजोराने धडधडू लागलं.सर्वांगाला घाम फुटला.तिच्या आयुष्यातला सर्वात मोठा भाग्याचा क्षण आला होता.नागोजीने वर्णन केलेलं ते ठिकाण म्हणजे वाड्यातल्या स्वैपाकघरातलं बळद असं रंगीच्या मनाने ठाम घेतलं.तरीच आपल्याला भाई सारं घर सारवायला सांगतात पण स्वैपाकघर मात्र कधीच सारवायला सांगत नाहीत.ते त्या स्वतः सारवतात.तिथे नक्कीच धन असणार.नागोजी म्हणतो.ते खरंच असणार.आता फक्त ते धन कसं मिळवायचं ते ह्या नागोजीबाबाकडून समजून घ्यावं लागेल.कितीही कठीण आणि कडक व्रत असलं तरी ते करावं लागेल.धन मिळवण्यासाठी एवढी साधना तर करायलाच पाहिजे.करू आपण एकदा का धन मिळालं की,मग मोठ्ठा वाडा बांधू.आपण कुणाच्या घरी काम करायला जायचं नाही.आपणच एक नाही दोन दोन बाया कामाला ठेवू.रंगीचे विचार डोक्यात मावेनासे झाले.कानशिलं तापली.कपाळाच्या शिरा इतक्या फुगल्या की,त्या आत्ता फुटतील की काय असं तिला वाटलं. त्तेजित स्वरात तिने नागोजीला विचारलं,

"नागोजी,काय उपासना केली पाहिजे ते लगेच सांग. कसंही करून मला ते धन पाहिजे.गावातल्या बऱ्याच जणांना संशय आहे की,वाड्यातल्या बळदात धन आहे. म्हणूनच तिथून साप अन् नाग निघतात !"

नागोजीने परत डोळे मिटले.काही क्षण स्तब्धतेत गेले. आता त्याला डोळ्यांसमोर काय दिसतंय,तो काय सांगतो हे ऐकायला रंगी अधीर झाली होती.

"रंगूबाई,हे काही माझ्या आटोक्यातलं काम नाही. आता मी निघतो.तुम्ही उद्या मठीवर या.बाबांना शरण जा. बाबाच काय ते तुम्हाला सांगतील."

कपड्यांचा सळसळ आवाज करत नागोजी दार उघडून रंगीच्या खोलीबाहेर पडला.रात्रीच्या काळोखात दिसेनासासुद्धा झाला.रात्रभर रंगीला झोप लागली नाही. सकाळी लवकरच ती मठीवर पोहचली.दोन तास ताटकळत वाट पाहिल्यावर नागोजीने तिला बाबांच्या ध्यानाच्या खोलीत नेलं.बाबांनी मिटल्या डोळ्यांनीच विचारलं,

"आलीस ? म्हटल्याप्रमाणे शोध तर लागलाय. नागोजीने तिथे पाहिलंय हे आम्ही इथे स्थानावर बसून पाहिलंय.आता ते मिळवणं फक्त तुझ्या इच्छाशक्तीवर अवलंबून आहे."

"बाबा,लौकर सांगा.वाटेल ते करायची तयारी आहे माझी !" रंगीच्या आवाजात अधीरता ओतप्रोत भरली होती. बाबांनी व्याघ्रजिनावर पद्मासन घातलं.नागोजीने रंगीला एकदम शांत बसायची खूण केली.

राहिलेला भाग पुढील लेखामध्ये…..★★★