* विजय गायकवाड | Vijay Gaikawad

live

नमस्कार आपले स्वागत आहे. मी पुस्तके आणि मित्रांवर पैसे खर्च करतो,माझ्याकडे दगड आणि विटांवर खर्च करण्यासाठी पैसे नाहीत.- रस्किन बाँड.ही थोर माणसं व त्यांचे विचार मला पुस्तकात भेटलीत.ती भेटली आणि त्यांनी सांगितले कि, प्रत्येक दिवशी असं काही तरी करा की,ते तुम्हाला अधिक सुंदर उद्याच्या दिशेने खूप लांबवर घेऊन जाईल."- डोग फायरबाऊ.' सर्वियन कादंबरीकार मिलोराद पावीच यांचे एक वाक्य आहे ते म्हणतात - जोवर जगात पुस्तक वाचणाऱ्या वाचकांची संख्या बंदूकधारी सैनिका पेक्षा अधिक आहे तोवर काळजीच काहीच कारण नाही.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात.पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये.म्हणून अविरतपणे प्रयत्न करणारे मार्गदर्शक, मित्र धावून येतात.प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,डॉ.दीपक शेटे,आ.भरत बुटाले,प्रा.सर्जेराव राऊत,सुभाष ढगे,अनिल फारणे,डॉ.सुधीर सरवदे ,विश्वास खाडे, विनायक पाटील,संजय कुंभार,सतीश खाडे,मनोहर सुर्वे,गणेश खंदारे,तात्या गाडेकर, दादासाहेब गाडेकर, दादासाहेब ताजणे, पुस्तकातील घटना प्रसंग सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील यांनी केलेले आहे. मला लिहिण्याची प्रेरणा देणारी पुस्तके,लेखक,प्रकाशक,मित्र ही जगावेगळी माणसं माझ्या जीवनातील महत्वाचा टप्पा आहेत.... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ.मेघा गायकवाड, चिरंजीव मयान,माझ्या धावण्यातील गुरुवर्य नामदेव बरुरे,लुल्ला शेख मोठी ताई ,लहान ताई जयश्री शिंदे या सर्वांचेच मनापासून आभार व धन्यवाद मॅट्रिक फेल विजय गायकवाड

६/२/२६

५.६ पेशीचक्र / 5.6 Muscle Cycle

प्रत्येक पेशी ही आपल्या आयुष्यात अनेकदा विभाजित होते.पण विभाजित होण्याव्यतिरिक्त इतर वेळी विभाजित होण्यासाठी ती तयारी करत असते. या दोन्ही गोष्टींना मिळून 'सेल सायकल' म्हणतात.


हे म्हणजे एखाद्या कॅन्टीनमध्ये रोज जर १०० प्लेट पदार्थ तयार करून विकावा लागत असेल तर तिथे काम करणारे लोक जसे आदल्या दिवशी किराणा आणि भाजो खरेदी करून आणतील,

संध्याकाळी भाजी निवडून,चिरून ठेवतील आणि सकाळी तो पदार्थ ५ मिनिटांत तयार होईल इतपत तयारी करून ठेवतील आणि आणि कॅन्टीनमध्ये प्रत्यक्ष पाहुणे येऊन त्यांनी ऑर्डर दिल्यानंतर लगबगीनं तो पदार्थ तयार करून, डिशमध्ये घालून तो त्यांना वाढला जाईल.खरं तर बाहेरून हे सगळं बघणाऱ्याला असं वाटेल की कॅन्टीनमधले आचारी तर लोक खायला आल्यावर तो पदार्थ तयार करताहेत,मग इतर वेळी ते बसून राहतात का? तर इतर वेळीही ते काम करत असतात,पण त्यातून प्रत्यक्ष उत्पन्न किंवा परिणाम मात्र काहीच दिसत नाही. पण ही तयारी दुसऱ्या दिवशी उत्पादन देण्यासाठी गरजेची असतेच.शिवाय मध्ये मध्ये योग्य तो किराणा आणि योग्य त्या प्रमाणात आणलाय का? शिवाय, मसाला योग्य प्रकारे तयार झालाय का? आणि आता व्यवस्थित पदार्थ तयार होऊ शकतो का? हे त्या कँटिनचे मॅनेजर किंवा मालक मध्ये मध्ये येऊन पाहून जातच असतात. हे सगळं अगदी सेल सायकलसारखंच चाललेलं असतं!


सर्वसाधारण मानवी पेशी दर २४ तासांनी एकदा विभाजित होते.त्यापूर्वी ती GI (गॅप१), S (सिंथेटिक), G2 (गॅप २) आणि M (मायटॉटिक) चार फेजेसमधून (टप्प्यांतून) जाते. पण एकोणिसाव्या शतकापर्यंत मायक्रोस्कोपमधून बघताना तर फक्त पेशी विभाजित होतानाच दिसत होती.पेशी ही प्रत्यक्ष विभाजनापूर्वी या चार टप्प्यांतून जाते याचा शोध वैज्ञानिकांना नंतर लागला.खरं तर सेल सायकल या प्रक्रियेत खूप लहान लहान गोष्टी माणसाला हळूहळू कळत गेल्या आणि हे शोध कोणा एका माणसानं लावले नाहीत तर अनेकांच्या संशोधनाचं ते एकत्र फलित आहे. पेशीच्या वाढीसाठी आणि प्रजननासाठी सेल सायकल ही प्रक्रिया गरजेची असते.


त्यामुळेच कोणत्याही सजीवाची वाढ होत असते.सेल सायकलमधला महत्त्वाचा भाग म्हणजे ऽ फेज. या फेजमध्ये पेशीतल्या DNA चं आणि क्रोमोसोम्सचं रेप्लिकेशन.म्हणजे आणखी एक प्रत तयार केली जाते. कोणत्याही सजीवाच्या शरीरात सेल सायकल सुरळीत चालत असतील तर त्या सजीवाची वाढ आणि जीवन योग्य प्रकारे होत राहतं.पण जर ही सेल सायकल नीट चालली नाही तर आनुवंशिक विकार किंवा कॅन्सरसारखे असाध्य आजार होऊ शकतात.


सर्वसाधारणपणे सेल सायकलमधल्या M फेजमध्ये मायटॉसिस प्रकारचं (सूत्री विभाजन) पेशी विभाजन होत असते.तर सेक्सपेशींमध्ये मियॉसिस (अर्धसूत्री) प्रकारचे पेशी विभाजन होते.मियॉसिसमध्ये क्रोमोसोम्सची संख्या निम्मी होते.त्यातून गॅमेट्स म्हणजे बीजांडपेशी किंवा शुक्रपेशी तयार होतात.यातून पुढे मग स्पर्मपेशी आणि बीजांडपेशी एकत्र येऊन त्यांतले वेगवेगळे क्रोमोसोम्स एकत्र येतात आणि त्यातूनच उत्क्रांतीसाठी आवश्यक असलेली वैविध्ये (व्हेरिएशन्स) घडून येऊ शकतात.या सगळ्यासाठी सेल सायकल ही सगळ्याच सजीवांच्या सजीवक्रियांसाठी आणि त्या सजीवाची जात टिकवण्यासाठी गरजेची आणि महत्त्वाची आहे.


पण मुळात सेल सायकल ही गोष्ट अस्तित्वात असते हे माणसाला कसं कळलं? सेल सायकलच्या शोधाच्या गोष्टीची सुरुवात ही पेशी विभाजनाच्या शोधापासूनच सुरू होते. एकोणिसाव्या शतकाच्या मध्यात पेशीची संकल्पना आली होती.पण त्यावेळी पेशी प्रजनन किंवा विभाजन कसं करतात हे माहीत नव्हतं.त्यातच श्वान आणि श्लायडेन यांनी कोणतीही पेशी ही पूर्वी अस्तित्वात असलेल्या पेशीतूनच जन्म घेते आणि पेशी हे सजीवांच्या अस्तित्वाचं एकक आहे हे सेल थिअरीतून सांगितलं.


नागेली आणि रेमाक (Nageli and Remak) यांनी वनस्पती आणि प्राणी यांच्यामध्ये पेशी विभाजन कसं होतं यावर संशोधन करून व्यवस्थित वर्णन केल्यानंतर खरं म्हणजे आपल्याला पेशी विभाजन कसं होतं ते कळायला लागलं.त्यानंतर व्हर्च या वैज्ञानिकानं पेशी या फिशन पद्धतीनं विभाजित होत असाव्यात असंही सांगितलं.साधारणपणे त्याच काळात कोलिकर (Kolliker) यानं गर्भाच्या पेशींचा अभ्यास केल्यानंतर पेशी विभाजित होण्यापूर्वी तिच्यावर क्लिव्हेज (फट) दिसते असे दाखवून दिलं.थोडक्यात, क्लिव्हेज ही पुढे होणाऱ्या पेशी विभाजनाची पूर्वसूचनाच म्हटली पाहिजे. यावर पुढे १८७० ते १८८० मध्ये प्रिंगशेईम,स्ट्रासबर्गर आणि हटीवग (Pringsheim, Strasburger and Hertwig) यांनी काम केलं.त्यांच्या संशोधनातूर असं कळलं की स्पर्म (शुक्रजंतू) आणि एग (बीजांड) या दोन वेगवेगळया पेशी असून त्यांच्या एकत्र येण्यातून बीजांडाचं फलन होतं.आणी पुन्हा चक्क एकपेशीयच झायगोट (युग्मज) तयार होतो. आणि त्यानंतर अनेकदा पेशी विभाजन होत होत त्या प्राण्याचो वाढ होते.यातून त्यांच्या असं लक्षात आलं,की प्रत्येक बहुपेशीय प्राण्यांच्या जीवनाचो सुरुवात एकाच पेशीतून होते. त्यामुळे पेशी विभाजन हे सगळ्याच सजीवांचं सगळ्यात महत्त्वाचं लक्षण असावं असं आता लक्षात आलं होतं.


त्यानंतरच्या काळात मायक्रोस्कोप्समध्ये आणि इतर तंत्रांमध्ये सुधारणा झाल्या.त्यामुळे मायटॉसिस या सेल सायकलच्या सगळ्यात महत्त्वाच्या पायरीमध्ये क्रोमोसोम्समध्ये काहीतरी बदल होतात हे १८८० च्या दरम्यान वॉल्टर फ्लेमिंग आणि स्ट्रासबर्गर यांच्या लक्षात आलं.पेशी विभाजनाच्या पूर्वी न्यूक्लियसमधले क्रोमोसोम्सचे धागे लांब होतात आणि पेशीमधल्या दोन टोकांकडे जायला लागतात. त्यानंतर मायटॉसिस (पेशी विभाजन) होतं आणि हे धागे पुन्हा आखडले जातात असंही आता समजलं होतं.


यानंतर काहीच काळात फॉन बेनेडन यानं प्रत्येक क्रोमोसोम्सचे दोन अर्धे भाग हे न्यूक्लियसच्या दोन्ही टोकाला जाऊन दोन वेगवेगळ्या न्यूक्लियसमध्ये विभागले जातात,हे दाखवलं.


यानंतर वाइजमननं बेडकांची अंडी आणि स्पर्म्स यांच्यावर एक प्रयोग केला.त्यातून त्यांना प्रत्येक बीजांडाला फलित करायला एक आणि एकच स्पर्म गरजेचा असतो असं लक्षात आलं.बेडकांची अंडी आणि स्पर्म ही दोन्हीही त्यांच्या शरीराबाहेर पाण्यात सोडली जातात.त्यामुळे पाण्यात स्पर्म आणि बीजांडाच्या जास्तीत जास्त जितक्या जोड्या तयार होऊ शकतील तितकेच गर्भ तयार होऊ शकतात,असं या प्रयोगातून लक्षात आलं.या प्रयोगांतून आणि संशोधनातून आता क्रोमोसोम्स हे आनुवंशिकतेचे एकक असतात आणि जर्म सेल म्हणजेच बीजांड आणि स्पर्म हे आनुवंशिकतेचे वाहक असतात हे वाइजमननं ओळखलं होतं.


याच जर्म सेल्स आनुवंशिकता आणि पुढच्या पिढ्या यांच्यातला दुवा असतात.


आता १९००च्या दरम्यान मेंडेलचे आनुवंशिकतेचे नियम पुन्हा जवळपास चार दशकांनी जगासमोर आले होते. त्यातून आता आनुवंशिकता आणि सेल सायकल यांचा संबंध काय आहे हे ह्यूगो डी व्हॅरिस, कोरेन्स आणि सेमार्क (DeVries, Correns,and Tschermak) यांच्या कामातून समोर आला होता. झायगोटमध्ये कोणत्याही गुणासाठी दोन संच असतात. तर आई आणि वडिलांकडून येणाऱ्या गॅमेटसमध्ये प्रत्येक गुणासाठी एकच संच असतो हे मेंडेलनं सांगितलं होतं.आता गॅमेटसमध्ये असणारे अर्धे कमोसोम्स (हॅप्लॉइड) आणि इतर पेशींमध्ये असणारे संपूर्ण संच (डिप्लॉइड) या आताच्या संशोधनाला पुष्टी देणारेच होते.मॅडेलचे ओबडधोबड वाटणारे नियम खरं तर सेल सायकलच्या वेळी क्रोमोसोम्सच्या विभाजना विषयीच नेमकं भाष्य करत होते ! या सगळ्या गोष्टींवर विसाव्या शतकाच्या पहिल्या दोन दशकांत पुन्हा संशोधन होऊन शिक्कामोर्तब झालं.आणि त्यानंतर फक्त पेशी विभाजन ही प्रक्रिया महत्त्वाची नसून,संपूर्ण सेल सायकलच कोणत्याही सजीवाच्या संपूर्ण वाढ, विकास आणि आनुवंशिकता यांच्यासाठी महत्त्वाची आहे असं लक्षात आलं.


यानंतर सेल सायकलमध्ये चालणाऱ्या घटना का आणि कशा तऱ्हने नियंत्रित होत राहतात या गोष्टी हळूहळू कळायला लागल्या.प्रत्येक पेशीमध्ये न्यूक्लियस आणि सायटोप्लाझम यांच्या आकारमानात एक विशिष्ट प्रमाण असतं आणि हे प्रमाण बदललं की ती पेशी विभाजनाच्या तयारीला लागते असं हर्टविग यानं सांगितलं.या प्रमाणाला त्यानं कॅरिओसायटोप्लाझमिक / न्यूक्लिओसायटोप्लाझमिक रेशो असं म्हटलं.यानंतर लगेचच पेशीच्या पृष्ठभागावर क्लिव्हेज दिसायला लागते.यानंतर सेल सायकल ही आणखी कोणकोणत्या गोष्टींनी नियंत्रित केली जाते त्या गोष्टी विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात समजायला लागल्या.


फेजेस


प्रत्येक युकॅरिऑटिक पेशी ही पेशी विभाजनानं जन्म घेते आणि जेव्हा ती पुन्हा विभाजित होते,तेव्हा तिचं स्वतंत्र अस्तित्व संपून पुन्हा दोन नव्या पेशींना जन्म देते. पेशी विभाजनाच्या या दोन घटनांच्या मध्ये एक संपूर्ण पेशीचक्र घडतं.यालाचा सेल सायकल असं म्हणतात. सेल सायकलमध्ये G1, S, G2 आणि M हे चार टप्पे म्हणजे फेजेस असतात.


पहिल्या गॅप फेजमध्ये (G1) प्रत्येक पेशीचा आकार वाढतो,S फेजमध्ये त्या पेशीतल्या DNAचं रेप्लिकेशन म्हणजेच DNA ची आणखी एक प्रतिकृती तयार केली जाते.दुसऱ्या गॅप फेजमध्ये (G2) सगळा DNA व्यवस्थित कॉपी केलाय का? त्यात काही चुका तर नाही ना झाल्या हे तपासलं जातं.तर M म्हणजेच मायटॉटिक फेजमध्ये नव्यानं तयार झालेल्या दोन न्यूक्लियसमध्ये नव्यानं तयार झालेले क्रोमोसोम्स सारखे वाटले जातात. यातून एक मूळ पेशी ही दोन नव्या पेशींमध्ये विभाजित होते.ही संपूर्ण सायकल काही मिनिटांमध्ये ते काही दिवसांमध्ये घडते.

माणसांमध्ये सेल सायकलचं एक चक्र पूर्ण व्हायला साधारणपणे एक दिवस लागतो. पहिल्या तीन फेजेसना एकत्रितपणे इंटरफेज म्हणतात. आणि याच फेजला सगळ्यात जास्त वेळ लागतो आणि उरलेल्या दुसऱ्या फेजला मायटॉटिक फेज म्हणतात. प्रत्येक सजीवातली प्रत्येक पेशी ही कायम यापैकी कोणत्या तरी एका फेजमध्ये असते.पण गंमत म्हणजे न्यूरॉन्स,

हृदयाच्या पेशी आणि शरीरातल्या आणखी काही पेशी या कधीही सेल सायकलचं एकही चक्र पूर्ण करत नाहीत,त्या कायमच GO या फेजमध्ये थांबलेल्या असतात.याशिवाय एकदा एखाद्या पेशीनं या सेल सायकलमधली एखादी पायरी किंवा टप्पा पार केला तर ती पेशी पुन्हा मागच्या पायरीमध्ये जाऊ शकत नाही, याचाच अर्थ सेल सायकल ही एकाच दिशेनं चाललेली प्रकिया असते.हे रॉबर्ट जॉन्सन यानं १९७० मध्ये शोधून काढलं.


चेक पॉइंट्स


प्रत्येक पेशीमध्ये सेल सायकल नियमितपणे चाललेली असली तरी कॅन्सरच्या पेशीमध्ये हे चक्र विस्कळीत झालेलं असतं.मायक्रोबायॉलॉजिस्ट डोनाल्ड विल्यमसन यानं १९६५ मध्ये DNA वर रेडिओ अ‍ॅक्टिव्ह लेबलिंग केलं.खरं तर त्याला DNAचं रेप्लिकेशन कसं होतं ते पाहायचं होतं.तो यीस्टच्या पेशींवर हे प्रयोग करत होता.हे करत असताना त्याला, बहुपेशीय युकॅरिऑटिक प्राण्यांच्या पेशींमध्ये जशा फेजेस असतात तशाच फेजेस यीस्टमध्येसुद्धा पाहायला मिळाल्या.यावरून त्याला आपल्या शरीरातल्या पेशींच्या सेल सायकलचा अभ्यास करायचा असेल तर आपण यीस्टचा अभ्यास करूनही हे समजून घेऊ शकतो हे लक्षात आलं.त्यानंतर असाच अभ्यास करत असताना हार्टवेलनं अनेक म्यूटंट पेशींमधल्या सेल सायकलचा अभ्यास केला आणि त्यातून सेल सायकल नियंत्रित करणारेही अनेक जीन्स असतात हे शोधलं.अशा जवळपास १२ जीन्सचा त्यानं १९७० च्या दरम्यान शोध लावला. पण त्यातल्या त्यात 'सेल डिव्हिजन सायकल २८' हा जीन फारच मजेशीर होता.त्यालाच मग सीडीसी २८ (CDC28) किंवा स्टार्ट जीन्स असं नाव मिळालं.कारण हाच जीन्स कोणत्याही पेशीनं जी १ फेजमध्ये प्रवेश करून नवी सेल सायकल सुरू करायची की नाही किंवा केव्हा करायची हे ठरवत होता.यातूनच पुढे चेक पॉइंटची संकल्पना आली.


हार्टवेलचा रिसर्च वाचून ब्रिटिश जेनेटिसिस्ट पाऊल नर्स याला यात फारच रस वाटायला लागला.तो मग एडिंबरो विद्यापीठात गेला आणि हे सगळं झूऑलॉजिस्ट मुर्दोच मित्विसन (Murdoch Mitchison) याच्याकडून शिकून घेतलं.मित्विसन यानं यीस्टवर बराच अभ्यास केला होता.आता हे शिकून घेतल्यानंतर नर्सनं यावर चक्क स्वतःच पुढे संशोधन सुरू केलं.त्यानं योस्ट पेशीचे म्यूटेट प्रकार घेतले.हे म्यूटंट असे होते,की ते एका ठरावीक ताप‌मानाला आहेत त्या फेजमध्ये थांबत होते आणि तापमान बदललं की पुन्हा आपली सोल, सायकल चालू करत होते.या प्रकारच्या यीस्ट्सवर अभ्यास करून नर्सनं १९७५ साली सेल सायकल जीर या फेजमध्येच थांबवणाराही एक जीन असतो हे शोधून काढले.त्याला मग CDC2 असं नाव दिलं.या जीन्सच्या नियंत्रणामुळेच कोणतेही सेल्स हे जीर फेजमधून M मध्ये जाऊ शकत होते! म्हणजे हाही एक चेक पॉइंट झाला.


उदाहरणार्थ,एखादी जखम भरून येण्यासाठी आणि वाढीसाठी पेशी विभाजन होत राहते आणि त्वचा जुळून आली की ती थांबते म्हणजेच हाही चेक पॉइंट आहे.पुढे नर्सनं हेच तंत्र वापरून माणसांमधलाही CDC2 जीन शोधून काढला.


….समाप्त…!!

४/२/२६

अशी पाखरे येती /That's what happens

धुक्याचा पुंजका


पावसाळा हा बगळ्यांच्या विणीचा हंगाम.या वेळी श्यामल वर्णाच्या आकाशपटलावरील त्यांचं श्रेणीबद्ध उड्डाण खरोखरीच सृष्टीतील एक अनुपम व मनोहर दृश्य वाटते.या वेळी त्यांच्या पाठी स्फटिकासारख्या पिसाच्या कलाबतूनं सुशोभित होतात.मेघ घुणघुणताहेत,वारा रुणझुणतो आहे आणि पाऊस रिमझिमतो आहे.अशा या भावोद्दीपक संगीताच्या पार्श्वभूमीवर बगळ्याच्या समूहाचं अंतरिक्षात चाललेल्या अनुनयाचं दृश्य तर स्वर्गीय असतं.वाटतं,जणू प्रभामंडल असलेला धुक्याचा विशाल पुंजकाच अंतराळात तरंगतोय.


निळी रेषा


तेजस्वी,निळी विद्युतगतीनं पाचूच्या पानापानांतून जाणारी ती रेषा आता माझ्या पूर्ण परिचयाची झाली होती.

चिमणीएवढं लांब चोचीचं ते पाखरू सांज सकाळ त्या ओढ्या खाडीची परिक्रमा करताना दिसून येई.हे त्याचं अठरा लक्ष योजनेचं उड्डाण पुनर्निर्मितीकरिता होतं.मृदु-मदिर स्वरात आतुरतेनं शीळ घालीत ते घरट्याकडे धाव घेतं.रत्नाचं सौंदर्य त्याला लाभलं होतं. शिलाजित,वैडुर्य,इंद्रनील व नाजूक नेचे या सर्वांच्या रंगांची पखरण विधात्यानं त्याच्या सानुल्या देहावर केली होती.


श्यामल शंख


समोर गवताळ सपाट टापू नजरेत मावत नाही.त्या कुरणातून मध्ये थोडा ओलसर चिखल असलेली व बाजूला वाळलेली अशी पाऊलवाट भांगासारखी शोभते.सात कोकणी लावा हळूहळू त्या पाऊलवाटेनं डौलात हारीनं चालत आहेत.किती देखण्या. गोजिरवाण्या.आकाशात उडत असलेल्या श्येनानं अवचितपणे खाली झेप टाकली.पाचूच्या गवतात त्या थिजल्या.जणू सात चित्रित श्यामल शंखांप्रमाणं त्या सुंदर दिसल्या.


वाक् वाक्


मला जाग आली.समोरील खिडकीच्या नितळ काचा कृष्ण पक्षातील मावळतीकडील चंद्रकलेच्या प्रकाशानं उजळल्या होत्या.अजून उजाडलं नव्हतं.ढोकरीच्या काळ्या सावल्या एकामागून एक खिडकीच्या तावदानावरून तरंगत जाताना दिसत.त्यांच्या वाक्-वाक् ह्या मन विचलित करणाऱ्या चिरपरिचित आवाजानं वातावरणात गूढ रम्यता येते.


इतक्यात आकाशातून एक खपुष्प धरित्रीवर झेपावलं. मला माझ्या आजीची आठवण झाली.हातात कवड्यांची माळ घेऊन निळावंतीची पोथी वाचणारी ! माझ्यावर तिचा फार लोभ.

निळावंतीच्या पोथीतील अनेक रहस्यं ती मला सांगे.मी एकदा तिला विचारलं,


"आजी,हे तुटलेले तारे कोठे ग पडतात?" कितीतरी वेळ ती गप्प बसली.बोलेनाच.


"सांग ना ग!" मी लाडिकपणे तिला विचारलं.


ती बोलली नाहीच. तिनं अंगुलीनं समोरचा जलाशय दाखविला.


जलाशयाचं मला मोठं आकर्षण वाटतं.त्या गूढ रम्य जलाशयाकाठी मी तासन् तास् बसून राही.मोठा झालो. एकदा माझ्या सृष्टिज्ञानी मित्राबरोबर जलाशयाच्या काठावरून फिरताना अद्भुत प्रकारचे पदार्थ पाण्यात तरंगताना दिसले. त्याकडे लक्ष वेधून तो म्हणाला, "ही आकाशातून पडलेली खपुष्पं आहेत. ढोकरी ही खपुष्पं खातात."


मोर शिंगारत राहिला


गौंडी बोलीत कोतवाल पक्ष्याविषयी एक अर्थपूर्ण म्हण आहे. 'मोर शिंगारत राहिला अन् गोचा राजा झाला.' गोचा स्वभावानं खरोखरंच राजा आहे. 'किंग क्रो' हे त्याचं इंग्रजीतील नाव यथोचित आहे. एवढासा जीव पण कित्येकदा मोरघारी, कावळे, घारी, बहिरी ससाणे व श्येन पक्ष्यांना हुसकावून देण्यासाठी त्यांचा पाठलाग करताना मी पाहिले आहे.कसा त्यांच्यावर तुटून पडावयाचा. ते दूर निघून गेल्यावर पुन्हा तो त्या वृक्षावर यायचा. त्या वृक्षावर अनेक भीरू पाखरांनी आश्रय घेऊन घरटी केलेली असायची.


एक-दोन तर कधी चार-पाचाच्या समूहातून ते तळ्याकाठच्या झुडपातून हवेत सूर मारायचे. बाणासारखी त्यांची शेपटी.जणू हवेत काळे बाण सुटत आहेत असे वाटायचे.जलाशयातील लव्हाळ्यावरील कृमि कीटकांचा अलगद वेध घ्यायचे.एकदा तर सोनपाठी सुताराचा पाठलाग करीत त्याच्या चोचीतील चारा त्यानं हिसकावून घेतला.सुतार पक्षी 'किलीलीली' करीत असहायपणे ओरडत राहिला.


झिलाणीवरच्या हिरव्यागार देवधानावर संध्याछाया पडायच्या. बुलबुलाची गोड किलबिल झुडपाझुडपांतून निमून जायची. एखाददुसरी पाणकोंबडी जंगलातून निःस्तब्धपणे उडत झिलाणीवर यायची. तळ्याच्या मुखातून मासे उड्या मारताच चांदीसारख्या त्यांच्या पाठी चमकत असताना डुबकन आवाज होई. धीवरांच्या डोंगी किनाऱ्याकडे झपाट्यानं येताना दिसायच्या. त्यांच्या हातातील लांब काठीनं ते वल्हवीत किनाऱ्याला पोहोचायचे.अशा कातर वेळी गोचा मात्र लव्हाळ्यावर बसून तर कधी उंच आकाशात सूर मारून कृमि-अळीचा वेध घेई. अंधार वाढत राही. त्याच्या काळ्या सावल्या त्यात विरघळून जायच्या.


जलाशयावरील रत्ने


बांधाखालच्या अंगाला असलेल्या पुरातन वृक्षांच्या प्रचंड फांद्या बांधावरून ओणावतात.जलाशयातील पाण्यात पाहतात.त्यांचे वेडेवाकडे अजगरासदृश प्रतिबिंब त्यात तरळताना दिसते.उडत असलेल्या,बसलेल्या स्थितीतील विविध आकारांचे लहान-मोठे किती तरी किलकिले पाहून आश्चर्ययुक्त आनंद वाटे.तेजस्वी काळ्या-पांढऱ्या वर्णाच्या कवडी किलकिल्यांना कृष्ण व श्वेत रत्नांच्या वर्णाची पिसे पांघरून उडताना पाहून ते आकाशगामी जलदेवतेसारखे वाटत.त्यांची काळ्यापोवळ्यासारखी लांब चोच देदीप्यमान वाटे.तेथे काही मोठे किलकिले जोडीने बसले होते.त्यांच्या डोक्यावरील काटेरी काही पिसे शेंडीसारखी उभी होती.पाठीवरची पिसे पांढरी-करडी होती.छातीची पिसे सुंदर तांबडी दिसायची.रान कबुतराएवढ्या आकाराच्या किलकिल्यांच्या चोची चाकूच्या पातीएवढ्या रुंद दिसत. अगदी चिमणीएवढे किलकिले लवचिक नाजूक अशा जलवनस्पतींच्या फांद्या आपल्या प्रवाळ रंगाच्या पायांनी घट्ट धरून बसलेले होते.जलाशयाच्या पृष्ठाला अलगदपणे स्पर्श करीत,देवनळाच्या सळसळीशी स्पर्धा करीत अवर्णनीय अशा त्यांच्या सुंदर निळ्या पाठी चकाकत.वाटे जलाशयावर जणू रत्नेच उधळली आहेत. त्यांच्या रूपाने जणू कुणी देदीप्यमान अशा निळ्या रेघाच जलाशयावर ओढीत असल्याचा भास होई आणि त्या रेषांतून पाण्यातील मासे चांदीसारखे चकाकत.


बेहड्यावरचा खोपा


जलाशयाला लागून झिलाणी व गूढ शांतता नांदत असलेल्या बोडी आहेत.ती बोडी तर देवधानानं झाकून गेली होती.कुठं एखादा निळ्या-हिरव्या पाण्याचा भाग सकाळच्या सूर्यकिरणात आरशासारखा लख्ख दिसायचा.आमच्या चाहुलीनं त्या बोडीतील देवभातात चरत असलेले अडईचे जोडपे भुर्रकन् झप् झप् पंख फडफडवीत सीसिक् सीसिक् आवाज करीत त्या जलाशयातून उंच निळ्या आकाशात उडू लागले. लांब मानेची-भुऱ्या रंगाची ती वन्य बदके या अद्भुत जलाशयावर घिरट्या घालीत उडत होती. बांधावर बेहडा, पिंपळ व मोहा यांचे पुरातन वृक्ष उभे होते. थोड्या वेळानं ती बेहड्याच्या पोखरीत दिसेनाशी झाली. अशा पुरातन वृक्षांच्या पोकळीत त्यांची गूढ घरटी असतात.


सावरीवरल्या वंडकी


समोर स्वयंभू जलाशय आणि त्याला लागून असलेले विशाल झिलाण.काळ्या रंगाची-पंखाला पांढरी किनार असलेल्या वंडकी दूरच्या बोडीवरून शीळ घालीत झिलाणीवर घिरट्या घालू लागल्या.त्या झिलाणीत एक सावरीचा महावृक्ष उभा आहे. तीन-चार वंडकीच्या जोडप्यांनी त्या वृक्षाच्या पोखरीत खोपी केली आहेत.त्या उंच विशाल वृक्षाभोवती काळ्या पांढऱ्या रंगाच्या वंडकी उडताना मोठ्या अद्भुत वाटायच्या. सकाळ-सायंकाळी ती गूढ घरट्याकडे झेप घेताना दिसायची.त्यांची पिलं आता जाणती झाली होती. चोचीत धरून त्या पिलांना घरट्यातून बोडीकडे नेतानाचं दृश्य निसर्गात दुर्मीळ आहे. एक एक पिलू ते त्या देवधानाच्या बोडीत आणून सोडत. नंतर ती नाजूक पिले तिथेच देवधानाचा चारा खाऊन लहानाची मोठी होत.


उत्तुम उत्तुम


सूर्य अस्ताला जाताना तर त्या स्वयंभू जलाशयाचं सौंदर्य अवर्णनीय असे.त्याच्या काठच्या गूढ हिरव्या झिलाणीतील देवभातावर नजर ठरत नसे.अशा वेळी उत्तुम-उत्तुम-उत्तुम असा केम कुकडी-वॉटर कॉकचा आवाज सायंतन शांततेत नादमाधुर्य ओतीत असे. वाटे तो आवाज अगदी जवळून येतोय.परंतु पाण्याच्या माध्यमातून तो आवाज फार दुरून येत असे. एखाद दुसऱ्या वेळी तो आपल्या लांब, लोंबत असलेल्या जड पायांनी थोडा फार गडप होई. त्यांच्या डोक्यावरचा तुरा संधिप्रकाशात उंच उडत लगेच देवभातात गडप सुंदर दिसे.जांभळ्या रंगाची केम आता देवभातात घरटी बांधीत होती.पाण्यावर काड्याकाटकीचे उंच- तरंगणारे ते घरटे असे.यात चार-पाच पांढरी अंडी असायची.केम दिसावयाचे क्वचितच.देवभातातून चालताना देवभाताची हालचाल व्हायची. तीच यांची चाहूल.


बगळे


तळी, झिलाणी,बोडी व तिथे आश्रयाला राहणाऱ्या ढोकरी,बगळे व त्यांची गूढ निवासस्थाने यांचा उल्लेख आपल्या प्राचीन साहित्यात आढळून येतो.हाल सातवाहनाच्या गाथासप्तशतीत रोजच्या दृश्यात आढळणाऱ्या बगळ्यांचे वर्णन केले आहे, ते अक्षर वाङ्मयात समावेश करण्यासारखे आहे.बगळी म्हणजे हिरवा शालू ल्यालेली गौरकाय लाडकी प्रिया. जलाशयाच्या किनारी एकान्तात प्रियकराची प्रतीक्षा करीत असलेल्या तिला पाहून कवीने त्या नाजूक भावप्रवण प्रसंगाचे वर्णन तितक्याच सहजतेने केले आहे.'पहा,कमळाच्या पानांमध्ये बगळी कशी एकाकी बसली आहे. जणू निर्मल पाचूच्या पूजापात्रात मोत्यांची शिंपली ठेवावी तशी ती शोभत आहे.' पण त्या प्रियेचे लक्ष कुठे आहे? अशा कातर वेळी सारंगागाराकडे उडत जाणाऱ्या बगळ्यांच्या पंक्तीकडे सारे ध्यान लागले आहे. तिच्या द्विधा, कातर मनःस्थितीचे वर्णन अलौकिक आहे."रविबिंब कोठे गेले ? चंद्र व तारे कोठे गेले ? ग्रहमान पाहण्यासाठी होराशास्त्रज्ञ रेघा काढतो, त्याप्रमाणे आकाशात बगळ्यांच्या रांगांनी काळ रेघा ओढीत आहे." बगळ्यांची रांग कुण्डलीमधल्या कोनासारखी असते हे सर्वांना ठाऊक आहेच.


मनोली


नवेगाव बांध जलाशयाकाठची पडार फुलली की त्या गुलाबी तांबूस मोहक फुलोऱ्यातून आसपासच्या तलाव, बोडी,

झिलाणीतील हिरव्यागार कोंगशीतून,पाणकणीस - नदीकाठच्या उसाच्या वाड्यांतून रंगीबेरंगी पाखरांचे थवेच्या थवे आहार-विहार करताना दिसले आणि स्मृतीचा ठेवा जागा झाला.पाणथळीतील लव्हाळी खसाच्या लवचिक काड्यांवर बसून ते हिंदोळे घ्यायचे,

कुठं सपाट जमिनीवरील गवताचे बी वेचताना पन्नास शंभरचा थवा भुर्रकन चिवचिव करीत उडायचा.किती प्रकारच्या ? तांबड्या रेड-मुनिया,तिलीया,स्पॉटेड मुनिया,काळ्या डोक्याच्या ब्लॅक हेडेड मुनिया,पांढऱ्या मानेच्या-व्हाइट थोटेड मुनिया,श्वेत पाठीच्या व्हाईट बॅक्ड मुनिया,हिरव्या रंगाच्या-ग्रीन मुनिया.त्यांच्या अपार्थिव सौंदर्याचा हेवा वाटायचा आणि रूपाला लाजेसे नाव 'मनोली'. सोनाली-रूपालीच्या परंपरेतलं नाव वाटतं हे.हिरवी मनोली फारच सुंदर दिसते. परंतु ही मनोली आता नामशेष होत आहे.


सात बहिणींच्या पाराखालच्या झिलाणीतील कोंगशीत त्यांची वीण ऑगस्ट-सप्टेंबरात होते. तिथल्या ढोपराएवढ्या खोल पाणथळीत हिरव्यागार पाचूची पवन बहरलेली असे.ह्या पक्ष्यांची इवलीशी घरटी अद्भुत व आनंददायी सौंदर्याचा जणू निधीच असे. घरट्याकडे झेप घेणाऱ्या ह्या गोजिरवाण्या, सुंदर पाखरांकडे पाहात मी सात बहिणींच्या पारावर तासन् तास बसत असे. समृद्धीबरोबर तिथे एक अनामिक गूढता नांदायची.


…..समाप्त…!!

२/२/२६

स्वप्नं- एक देणगी / Dreams - a gift

स्वप्नं बघणाऱ्यांना,भविष्यात डोकवायला मिळायचं असेल तर,त्यांच्या पोटात फक्त श्रद्धा पाहिजे,दुसरं काही नको.


दिवस कधीकधी असा उगवतो की अगदी आतून असं वाटतं की,आज खूप वेगळं असं काहीतरी घडणार आहे.दिवस कधीकधी असाही उगवतो की,अशा खूप वेगळ्या गोष्टी घडून,आपल्याला आश्चर्याचा धक्का देऊन जातात.


ठरलेल्या वेळेस जेसन स्टीव्हन्स यायचा म्हणून मी वाट बघत होतो.या भेटींपासून पुढच्या शोधयात्रेचा महिना सुरू व्हायचा असतो,आम्हा दोघांसाठी.बोस्टनच्या क्षितिजरेषेकडे पहात मी खिडकीशी उभा होतो.मनात रेड स्टीव्हन्सचे विचार होते.


ज्याच्यावर प्रेम असतं, त्याचा मृत्यू पचवणं कठीण असतं;

विशेषतः त्याच्या आठवणी जेव्हा सदासर्वकाळ तुमच्या मनात असतात. कांही लोकांचा आपल्यावर असा खोल परिणाम झालेला असतो,की ती माणसे आपला एक हिस्साच होऊन बसतात.रेड स्टीव्हन्सचा माझ्यावर तसाच परिणाम होता आणि मला माहीत आहे की त्याचा बऱ्याचजणांवर असा परिणाम झालेला होता.


खूपदा वाटून जायचं,फोन उचलावा,पलिकडून पश्चिम टेक्ससच्या बोलितला खरखरीत आवाज ऐकू यावा, मला प्रतिसाद मिळावा.

पण रेड स्टीव्हन्सनं माझ्या आयुष्यात आणलेल्या चांगल्या गोष्टी कायम माझ्याजवळ रहाणार आहेत,हे मला माहीत होते.


कॉन्फरन्स रूमच्या टोकाशी असलेल्या मोठ्या व्हिडिओ पडद्यावर रेड स्टीव्हन्स आमच्यासामोर आला.तो खरोखर अवलिया माणूस होता.आयुष्यात तो जे जे करीत गेला त्यातून त्याचा भन्नाटपणा उघड होत गेला.


"जेसन,तू तिथं बसला आहेस तेवढ्यात मी एक मिनीट वर्षभर चालणाऱ्या उपक्रमांची जबाबदारी घेतल्याबद्दल मिस्टर हॅमिल्टन आणि मिस् हेस्टिंग्ज यांचे आभार मानण्यासाठी घेणार आहे.मला वाटतं की तू लक्षात ठेवशीलकी माझ्या मृत्यूपत्रातील शेवटच्या मसुद्याप्रमाणे मी तुझ्यासाठी योजलेली सर्वोत्तम देणगीत तुला जेव्हा मिळेल,ती माझे प्रिय मित्र थिओडोर हॉमिल्टन आणि मार्गारेट हेस्टिंग्ज यांचा खूपच हातभार लागल्यामुळे मिळेल.मोठ्या पडद्यावर रेड इतका सजीव वाटत होता. मला त्याला सांगावसं वाटलं,मला हे त्याचं काम करतांना खूप आनंद वाटत होता.पण हे पण मला ठाऊक होतं की हे शब्द बोलण्याचा काही उपयोग नव्हता.मला मात्र वाटलं माझ्या पद्धतीनं जेसनच्या या प्रवासात त्याची साथ करण्यासाठी त्यानं मला निवडलं तेव्हा मला आनंद वाटला,हे त्याला ठाऊक असणार,


"जेसन या महिन्यात तू जो धडा शिकायचा आहेस,तो धडा आहे स्वप्न,एक देणगी.ही देणगी थोर स्त्री पुरूषांना मिळालेली असते.

स्वप्नं म्हणजे आपल्या जीवनाचा गाभा असतात.जीवन जसं आहे तसं नाही,तर ते जसं असायला हवं,म्हणजे स्वप्नं,खास लोकांच्या मनात, हृदयात,स्वप्नं जन्मतात.पण ती स्वप्नं फळाला आली म्हणजे सगळ्या जगाला त्यांचा लाभ घेता येतो.


"तुला माहीत नसणार,पण थिओडोर हॅमिल्टन देशभर उत्तम विधिज्ञ म्हणून ओळखला जातो.मला तो जेव्हा भेटला,तेव्हा तसं होण्याचं त्याचं स्वप्न मी ओळखलं होतं आणि गेली पन्नास वर्षे हे स्वप्न तो जगतो आहे.हे स्वप्न वास्तवात येण्याआधी त्याच्या मनात,त्याच्या हृदयात आकाराला आलं होतं.


"लुइझियानाच्या दलदलीतून भटकता भटकता टेक्ससमध्ये तेल आणि गुरंढोरं यांची सगळ्यात मोठी उलाढाल करणारा सम्राट होण्याची स्वप्नं मी पहात असायचा.ती स्वप्नं माझा इतका भाग बनून गेली की, जेव्हा माझं पण उद्दिष्ट मी गाठलं तेव्हा मी पूर्वी कधीच न राहिलेल्या आपल्या घरातच मुक्कामाला जणू पोचलो होतो.


 (सर्वोत्तम देणगी,जिम स्टोव्हॅल,स्वाधारित कलासामग्री,डॉन बिलिंग्ज,अनुवाद - दिशा केळकर EMBASSY BOOK DISTRIBUTORS ) "या सर्वोत्तम देणगीला निश्चित रूप देत असतांना, त्यातल्या त्यात सर्वश्रेष्ठ देणगी कोणती बरं,असं ठरवायचा मी प्रयत्न करत होतो.एकाच देणगीचं नाव घ्यायचं झालं तर मी स्वप्न ह्या देणगीचं नाव घेईन. 


जीवन कसं आहे त्यापेक्षा ते कसं असावं ही दृष्टी आपल्याला स्वप्नांमुळेच येते.या स्वप्नांमधूनच,या जीवनातून जी जी इतर देणगी मिळवायची असेल तिच्यासाठी मार्ग सापडतो."


रेड थोडा वेळ थांबला आणि तो विचारात गढून गेल्यासारखा वाटला.तो पुढे बोलायला लागला,"जेसन स्वप्नांची तुझी ओळख करून द्यायची तर आधी काही स्वप्नं कशी असतात,

याची तुला माहिती करून द्यायला हवी.आयुष्यभर अशा खूप स्वप्नांची मला जाण होती.


स्वप्नांबरोबरची माझी सलगी हा माझा ठेवा होता.


"मला आयुष्यात भेटलेला स्वप्न बघणारा सर्वात मोठा माणूस,लोकांच्या कल्पनाशक्तीला स्पर्श करील अशी ठिकाणं,अशा वस्तू तयार करण्याची त्याला प्रचंड आस होती.ही आस त्यानं आयुष्यभर जपली.त्याच्या वाट्याला माघार,मानहानी,अपयश नाहीतर हेटाळणीही आली.जेव्हा भेटायचा,तेव्हा तो त्याच्या नवीन योजनांविषयी,नवीन बेता विषयी माझ्यापाशी बोलायचा.भितीवर टांगायला नव्या नव्या स्वप्नांच्या पाट्या तयार करण्याची त्याला सवय लागली होती. आणि त्या योजनेच्या पुर्ततेसाठी आराखडे तो तयार करायचा.


"मला आठवतंय,तो मृत्यूशय्येवर होता.त्याच्या खोलीत छताला त्यानं त्याच्या नवीन योजनेचा आराखडा टाचून घेतला होता.

त्याच्या डोक्यात जसजसा त्या योजनेला आकार येत होता,

तसतसा तो त्या छतावरील आराखड्यामुळे जास्त स्पष्ट होत होता.


"रूग्णालयात त्याला भेटायला एक वार्ताहर आला. माझा मित्र इतका अशक्त झाला होता की त्याला जेमतेम बोलायला येत होते.तो पलंगावर जरा सरकला आणि वार्ताहाराला त्याने शेजारी आडवं व्हायला सांगितलं.असं केल्यानं छतावरच्या त्या आराखड्याकडे त्यांना नीट बघता येऊन त्याविषयी मित्राला चर्चा करता येणार होती.


"एका गंभीर दुखण्याशी झगडत असतांनाही एखादा माणूस एवढी आपली आस जपतोय हे पाहून तो वार्ताहर गहिवरला.वार्ताहाराने त्याची मुलाखात आटोपली.माझ्या मित्राचा त्यानं निरोप घेतला आणि तो रूग्णालय सोडून निघून गेला.


"नंतर त्याच दिवशी माझा मित्र गेला.


"तू मुद्दा निसटू देऊ नकोस बरं.मृत्यूशय्येपर्यंत आपली ज्वलंत स्वप्नं जोपासत,आयुष्यभर ती अगदी उत्कटपणे सांभाळणारा माणूस केवढा नशीबवान असला पाहिजे. आयुष्यभर माझा मित्र त्याच्या स्वप्नांमध्ये जगला.ती स्वप्नं सतत संख्येनं वाढायची आणि आकारानं मोठी व्हायची.त्यानं स्वप्नापैकी एखादा मैलाचा दगड गाठला की लगेच आणखी एखादं मोठं आणि एखादं जास्त दिव्य स्वप्नं त्याला खुणावत असायचं.


"अतिशय थेट पद्धतीनं खूप लोकांना स्वप्न बघायला आणि जास्त चांगल्या जगाची कल्पना करायला त्यानं शिकवलंय त्याचं नाव होतं वॉल्ट डिस्ने.


"पण तुला एक काळजी घ्यावी लागेल.आयुष्यभर जपायची स्वप्नं : ती केवळ तुझीच असायला हवीत. दुसऱ्या कोणाची ती असूच शकत नाहीत. आणि ती स्वप्नं संख्येनं आणि आकारानं वाढती रहायला हवीत.


"माझा दुसरा एक मित्र होता.त्याच नावं तुला माहीत नाहीये.तो म्हणायचा,खूप कष्ट करायचे आणि आयुष्याची पन्नाशी आल्यावर निवृत्त व्हायचं,असं त्याचं स्वप्न होतं.त्यानं खरोखर खूप कष्ट केले आणि धंद्यात अफाट यश मिळवलं.तो निवृत्त होण्याचं स्वप्न बाळगून होता.पण त्यापलिकडे कसलीच ओढ त्याला नव्हती.


"त्याच्या पन्नासाव्या वाढदिवशी आम्ही बरीचजणं जमलो.

त्याचा पन्नासावा वाढदिवस आणि त्याची निवृत्ती साजरी केली.त्यानं त्याचं स्वप्न नीट कशालातरी जोडून घेतलं असतं तर त्याच्या जीवनातला तो सर्वात आनंदाचा दिवस झाला असता.दुर्दैवानं त्याची सारी कर्तबगारीची वर्ष त्याच्या धंद्यासाठी खर्ची पडली. त्यात मात्र त्याला खूप अभिमान आणि आत्मसन्मान मिळाला.सुकाणूप्रमाणे वाट दाखवणारा उद्योगधंदा थांबवला तेव्हा अंगात जोम,ताकद असलेला तो माणूस निवृत्तीनंतर ढेपाळायला लागला.लवकरची निवृत्ती मिळावी असं त्याचं नेहमी म्हणणं होतं.पण लवकरच त्याच्या लक्षात आलं की त्याच्या जगण्याला आधार मिळावा अशी काही आस राहिलीच नाही."नंतर एकाच महिन्यानं माझ्या या दुसऱ्या मित्रानं आत्महत्त्या केली.


"एक स्वप्न पाहणारा माणूस,तो मृत्यूशय्येवर असतानाही जीवनभर जपलेल्या ओढीमुळे उत्साहित होत होता आणि दुसरा,ज्याचं स्वप्न त्याच्या व्यक्तिमत्त्वाला अगदी अशोभनीय होतं,त्यानी आत्महत्त्या केली.यांच्यातला फरक तुला स्पष्ट झालाच असेल.


"जेसन स्वप्न हे फक्त तुझं असणं फार महत्त्वाचं आहे.ते सब घोडे बारा टक्के नसतं.तुझ्या व्यक्तिमत्त्वाला शोभून दिसेल असं तुझं स्वप्न असावं.तुझ्याबरोबर ते स्वप्न ही वर्धिष्णू वाढत रहावं.त्या स्वप्नांची ओढ असणारा फक्त तूच असशील.


रेड स्टीव्हन्स थांबला,त्यानं घसा साफ केला,आणि असं वाटलं की त्याच्या मनाचं तारू दिशा बदलत आहे. शेवटी तो बोलू लागला. "जेसन,या महिन्यात स्वप्नांच्या देणगीच्या अनुभवाला तू सुरूवात करायची आहेस. सगळं शक्य आहे असं समजायचं.आयुष्यात काय काय करायचं,काय काय व्हायचं,काय काय मिळवायचं याची यादी कर.तुझ्या अंतःकरणाचा सर्वात जास्त कशाकडे ओढा आहे हे विचारात घेऊन अग्रक्रम कशाला द्यायचा ती यादी तयार करायची.


"महिन्याच्या अखेरीस तू त्यातल्या काही स्वप्नांबद्दल मिस्टर हॅमिल्टन बरोबर बोलायचे.


उत्तर बरोबर किंवा चूक असं नसणार.आणि लक्षात ठेव जशी वर्ष लोटतील तशी तुझी स्वप्नं वाढतील आणि विकसित होतील,

स्वप्नांपेक्षा महत्त्वाचं म्हणजे,स्वप्न बघणारा होण्याची प्रक्रिया.


"तुला सुंदर स्वप्नं बघण्याचं जीवन मिळो."


रेड स्टीव्हन्सची प्रतिमा लोप पावलीआणि कॉन्फरन्स रूममधल्या टेबलवर घडी घालून ठेवलेल्या हातांकडे जेसन क्षणभर बघत राहिला.शेवटी तो म्हणाला, "आयुष्यात आपण काय करायचं याविषयी मी कधीच विचार केला नाहीये.आपण जिवंत असतो आणि जीवनाचा प्रवाह दिवसामागून दिवस गेले की आपोआप चालू राहतो,असंच मला वाटतं."


मी उभा राहून दाराच्या दिशेनं चालता चालता म्हटलं, "जेसन स्वप्नं बघायला सुरुवात करायला ही छान वेळ आहे.आणि हे शिकायचं असलं तर रेड स्टीव्हन्सकडूनच शिकायचं.त्याच्याहून दुसरा कोणी चांगला शिक्षक नाही. महिन्याच्या शेवटी तुझ्या अहवालाची मी वाट बघतो."


कॉन्फरन्सरूममधून मी बाहेर पडलो,तेव्हा जेसन विचारांमध्ये गढलेला होता आणि मला वाटतं त्याच्या स्वप्नांमध्ये ही.तीन आठवड्यांनी मी माझ्या लिहिण्याच्या टेबलाशी जेसन स्टीव्हन्ससमोर बसलो होतो आणि तो त्याच्या जीवनभराच्या स्वप्नांबद्दल बोलत होता.तो दिवस मी कधीच विसरणार नाही.त्यानं सुरूवात हळूहळू केली होती,पण तो मग बोलण्याच्या रंगात आला.


"सुरूवातीला मला काय करायचंय,कोण व्हायचंय, काय हवंय याची एक लांबचलांब यादी तयार केली.मग लक्षात आलं की ती काही वास्तविक पाहता स्वप्न नव्हती मला हवं तर त्या गोष्टी करणं,तसं बनणं,त्या मिळवणं मला सहज शक्य होतं.आजवर त्या करायला मी वेळ किंवा उत्साह दाखविला नव्हता इतकंच.पण मी जेव्हा वॉल्ट डिस्नीचा विचार केला,तेव्हा माझ्या डोक्यात बऱ्याच गोष्टी आल्या." जेसन जरासा थांबला.त्यानं मिस् हेस्टिंग्जकडे बघून परत माझ्याकडे बघितलं.मला वाटतं त्याला प्रोत्साहन हवं होतं.मिस् हेस्टिंग्ज हसली आणि तिनं त्याच्याकडे बघत मान डोलावली.जेसननं बोलणं पुढे चालू ठेवलं.त्याचा विश्वास वाढायला लागला होता.


"कुठल्या तरी मार्गानं,वंचित तरूण माणसांचं आयुष्य सुधारावं म्हणून मला काही करता यायला हवं.म्हणजे माझ्या डोळ्यासमोर गरीब तरूण माणसं नाही येत.ज्या लोकांच्या कल्पनेतही स्वतःची ताकद,उत्कट इच्छा, मूल्ये या गोष्टी नाहीत की ज्यामुळे त्यांचे आयुष्य अर्थपूर्ण नाही,अश्या लोकांसाठी मला काम करायचंय. माझे आजोबा रेड माझ्यासाठी जे करताहेत ते मी एका प्रकारे दुसऱ्या तरूणांसाठी करणार आहे."


मिस् हेस्टिंग्जने टाळ्या वाजवल्या.आणि ती आनंदानं म्हणाली, "जेसन मला हे ऐकून फार उत्तेजित वाटतंय. तू किंवा दूसरा कोणी याहून चांगलं आपल्या आयुष्यात करील असं मला वाटत नाही. "जेसन माझ्याकडे बघून म्हणाला, "तुम्हाला हे ठीक वाटतंय ना ?"


हसत मी उत्तर दिलं, "जेसन,चाळीस वर्षांच्या सहवासानंतर मी एक तत्त्व शिकलो आणि ते असं की आयुष्याच्या लढाईत टिकाव धरायचा तर नेहमी मिस् हेस्टिंग्जशी सहमत व्हावं.आणि खरंच माझंपण तिच्यासारखंच मत आहे.तुझ्या जगण्यासाठी एक अगदी छान स्वप्न,एक योग्य ध्येय तुला मिळालं.तुझ्या आजोबांच्या मित्रांच्या गोष्टींची सतत आठवण ठेव. आजोबांनी तुला त्या गोष्टी ऐकवल्या आहेतच. तू जिवंत असेपर्यंत तुझ्या स्वप्नांना जिवंत ठेव."


मिस् हेस्टिंग्ज जेसनबरोबर लिफ्टपर्यंत गेली.मी आपल्या लिहिण्याच्या टेबलाशी एकटाच राहिलो. मी आपल्या स्वप्नांचा विचार करायला लागलो.ती आजही, माझ्या ऐशीव्या वर्षीही,माझी सोबत करत आहेत.पण तरी मी तेव्हाच शपथ घेतली की माझी सर्व स्वप्न टिकून असतील आणि वर ती वर्धिष्णूही असतील.


समाप्त...

३१/१/२६

माझ्या वातावरणातला मुलगा / A boy in my environment

ते बाह्य बदल क्युबामध्ये रोजच घडत होते.या क्रांतीबद्दल जाणून घेण्याची,जी ताकद खूप काळासाठी दाबून ठेवण्यात आली होती.त्या लोकांमधल्या ताकदीला जाणून घ्यायचा एक मार्ग म्हणजे क्युबामधल्या सर्व संघटनांना,कार्यस्थळांना भेट देणं. आणि वैद्यकीय प्रश्नातील मन ओळखण्याचा एक मार्ग म्हणजे नुसती माहिती करून घेणं किंवा स्थळांना भेट देणं नव्हे तर ज्यांनी या संघटना,कार्यस्थळे उभारली त्यांच्याबद्दल जाणून घेणं.तिथे जा आणि त्यांना कोणते आजार आहेत,कोणते रोग झाले आहेत हे शोधा,त्यांनी इतकी वर्षे किती तीव्र गरिबी अनुभवली आहे,वारसा म्हणून मिळालेली दडपशाही आणि शरणागती सहन केली आहे ते पाहा.डॉक्टर,वैद्यकीय कर्मचारी अशा समाजातल्याच व्यक्तींनी मनापासून त्यांच्या नवीन कामावर जायला हवे.


डॉक्टरांचं काम नेहमीच महत्त्वपूर्ण असतं.जगामध्ये जे काही घडतंय त्याबद्दल माहिती असणं,रुग्णाच्या संबंधित काय घडतंय,रुग्णाची मानसिकता काय आहे, वेदनेचं दुःख काय आहे हे सगळं समजून घेणं हे डॉक्टरांच्या सामाजिक जीवनातलं.फार मोठ्या जबाबदारीचं काम आहे.


काही महिन्यांपूर्वी हॅवानामधल्या काही विद्यार्थ्यांच्या गटानं,काही नुकत्याच उत्तीर्ण झालेल्या डॉक्टरांच्या गटानं ग्रामीण भागात जायला नकार दिला आणि तिथे जायला जास्त पैशांची मागणी केली. मागच्या अनुभवावरून.हे असं घडणं स्वाभाविक होतं, कमीतकमी माझ्यासाठी तरी आणि मला ते समजले. मला आठवतं तसंच हे काही वर्षांपूर्वी होतं.पुन्हा एकदा हा एक बंडामधील योद्धा आहे.एका चांगल्या भविष्याची खात्री हवी असलेला हा एकाकी सेनानी आहे.चांगली स्थिती आणि त्यानं किंवा तिनं केलेल्या कामाची पावती त्याला हवी आहे.


जर हे ते लोक नसते तर काय झालं असतं? बहुतेक करून ज्यांची कुटुंबे त्यांच्या शिक्षणासाठी पैसे देऊ शकत होते,ज्यांनी त्यांचा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे आणि आता ते व्यावसायिक सराव सुरू करत होते. जादूनं म्हणा किंवा कसंही,जर विद्यापीठाच्या व्याख्यान हॉलमधून २०० किंवा ३०० शेतकरी बाहेर पडले असते तर काय झालं असतं ?


सोप्या भाषेत सांगायचं,तर ते शेतकरी त्यांच्या भावाला किंवा बहिणीला भेटण्यासाठी अतिशय आनंदाने लगेचच पळाले असते.त्यांनी शिक्षणासाठी दिलेली अनेक वर्षं वाया गेली नाहीत हे दाखवण्यासाठी त्यांनी सर्वाधिक जबाबदारी आणि सर्वाधिक काम असलेल्या पदांची विनंती केली असती.जेव्हा नवीन विद्यार्थी, कामगार आणि शेतकरी वर्गाची मुलं कोणत्याही प्रकारची

पदवी प्राप्त केल्यावर घडतं; ते तेव्हा तसंच घडलं असतं.


पण आपल्याला भविष्याकडे भीतीनं पाहण्याची गरज नाही आणि माणसांना कामगार वर्ग किंवा शेतकरी वर्गाच्या मुलांमध्ये आणि प्रतिक्रांती-विरोधकांमध्ये विभाजित करायला नको.ते सरळ आहे,

खरं नाही आणि क्रांतीत राहणाऱ्या माननीय व्यक्तीला त्यात शिकण्यासारखं काहीही नाही.


आमच्यापैकी जो पहिला गट ग्रॅन्वाला पोहोचला होता, ज्यांनी स्वतःला सिएरा मेस्त्रामध्ये स्थापित केलं होतं,जे त्यांच्यासोबत राहणाऱ्या शेतकरी आणि कामगारांचा आदर करायला शिकले,त्या कोणालाही शेतकरी किंवा कामगार असण्याचा भूतकाळ नव्हता.

साहजिकपणे ते असे होते,ज्यांना काम करायचंच होतं,ज्यांना लहानपणापासून काहीतरी हवं होतं.पण भूक,खरी भूक काय असते हे कोणालाही माहीत नव्हतं, आणि आम्हाला तात्पुरत्या,दोन वर्षांच्या मोठ्या कालावधीनंतर ते समजायला लागलं होतं. 


आणि त्या नंतर खूप गोष्टी स्पष्ट होत गेल्या.एका माणसाच्या आयुष्याची किंमत पृथ्वीवरच्या सर्वांत श्रीमंत व्यक्तीच्या संपत्तीपेक्षा करोडो पटींनी जास्त आहे हे आम्ही उत्तम प्रकारे शिकलो.आम्ही कामगार किंवा शेतकऱ्यांची मुलं नव्हतो,ही गोष्ट आम्ही तिथे शिकलो. मग आम्ही हे कशासाठी चार दिशांना ओरडून सांगायला हवं की आम्ही कोणीतरी विशेष आहोत आणि बाकी उरलेले क्युबन लोक शिकूदेखील शकत नाहीत? होय ते शिकू शकतात.खरंतर क्रांतीची हीच अपेक्षा आहे की त्यांनी शिकायला हवं,अपेक्षा आहे की त्यांना हे समजायला हवं की चांगल्या उत्पन्नापेक्षा आपल्या नेत्याची सेवा करणं जास्त महत्त्वाचं आहे,कृतज्ञता कायमस्वरूपी टिकणारी आहे,एखाद्याने जमा केलेल्या सोन्यापेक्षा जास्त काळ टिकणारी आहे.प्रत्येक डॉक्टरने त्याच्या कार्यवर्तुळातही लोकांची कृतज्ञता मिळवली पाहिजे.हा मौल्यवान खजिना मिळवू शकतो आणि त्यानं तो मिळवायला हवा.


आपण आपल्या जुन्या संकल्पना पुसून टाकायला हव्यात आणि लोकांच्या जास्तीतजास्त जवळ जायला हवे.आधीसारखे नाही,

कारण तुम्ही सर्व असे म्हणाल, नाही,मी तर लोकांचा मित्र आहे.

मला कामगार आणि शेतकरी लोकांशी बोलायला आवडते,आणि मी रविवारी अशा अशा ठिकाणी असं... असं बघायला जातो. प्रत्येक जण ते करतो.पण ते लोक दानधर्मासाठी करतात आणि आपण हे एकतेसाठी करतो.आपण पण "हे बघा आम्ही आलो आहोत", हे सांगण्यासाठी जायला नको."आम्ही इथे तुम्हाला काही द्यायला आलो आहोत,तुम्हाला आमचे विज्ञान शिकवण्यासाठी आलो आहोत,तुमच्या चुका दुरुस्त करण्यासाठी,तुम्हाला सुसंस्कृत बनवण्यासाठी,तुमच्या प्राथमिक ज्ञानाचा अभाव दूर करण्यासाठी आलो आहोत.आपण शोधात्मक भावनेच्या उत्साहाने जायला हवं, शहाणपणाच्या अशा महान स्रोतापासून शिकण्यासाठी लोक आहेत," हे आपण सांगायला हवं.


आपल्याला बऱ्याचदा अशी जाणीव होते की,आपण किती चुकीच्या संकल्पनांमध्ये होतो ज्या आपल्याला माहीत होत्या.त्या आपल्यातल्याच एक भाग झाल्या होत्या आणि साहजिकच आपल्या चेतनेचाही भाग झाल्या होत्या.प्रत्येक वेळेस आपण आपल्या सर्व संकल्पना बदलल्या पाहिजेत,केवळ सामान्य किंवा तांत्रिक संकल्पनाच नव्हे,तर काही वेळा वैद्यकीय संकल्पना

देखील.एखाद्या मोठ्या शहरात रोगांवर केले जातात तसे उपचार खेड्यात उपलब्ध नाहीत असं आपण नेहमीच पाहतो.आपण असं बघू की डॉक्टरांनासुद्धा शेतकऱ्यासारखं बनावं लागेल,त्याला किंवा तिला नवीन पदार्थांची लागवड करणं शिकावं लागेल,आणि आता एक गरीब देश असलेला क्युबा कदाचित जगातील सर्वांत श्रीमंत कृषिदेश असू शकतो, त्याच्या अन्नरचनेत विविधता आणण्यासाठी त्याच्या किंवा तिच्या उदाहरणातून नवीन प्रकारचे अन्न खाण्याची कला जोपासावी लागेल.आपण पाहू की अशा परिस्थितीत आपल्याला थोडं शैक्षणिक बनावं लागेल,कधी थोडं जास्तदेखील;कधी इतके राजकीयदेखील की आपण आपला शहाणपणा गमावणार नाही,आपल्याला हे दाखवून द्यावं लागेल की आपण लोकांसोबत शिकायला तयार आहोत.नवीन क्युबाच्या निर्मितीसाठी तो महान सुंदर अनुभव घ्यायला आम्ही तयार आहोत.


आपण आधीच महत्त्वाची पावलं उचलली आहेत. १ जानेवारी १९५९ आणि आजमधील अंतर पारंपारिक पद्धतीने मोजता येणार नाही.काही काळापूर्वीच लोकांना समजलंय की इथे फक्त हुकूमशहाच पडला नाही तर इथली पूर्ण व्यवस्थाच कोलमडली आहे.आता लोकांनी हे समजून घ्यायला हवं की या कोसळलेल्या व्यवस्थेच्या अवशेषांवरच अशी व्यवस्था उभी राहायला हवी-जी लोकांना परिपूर्ण आनंद देईल.


आमची अशी खात्री पटली आहे की शत्रू एक आहे. आपल्याला माहीत आहे की,प्रत्येक जण याची वाट बघत आहे की कोणीतरी त्यांचे ऐकून घेईन,आपला आणि संपूर्ण लॅटिन अमेरिकेचा शत्रू,युनायटेड स्टेटमधलं एकाधिकारशाहीचं सरकार आहे असं सांगण्यापूर्वी एकाधिकारशाहीच्या विरोधातलं आपलं मत स्पष्टपणे मांडण्यापूर्वी,दूतावासात कोणीतरी आपलं म्हणणं ऐकून घेऊन ते प्रसारित करेल.


जेव्हा सगळ्यांना माहीत आहे की शत्रू कोण आहे, जेव्हा शत्रूच्या विरोधात लढणाऱ्या लोकांमध्ये समान धागा असणं आपला सुरुवातीचा मुद्दा असेल,तेव्हा दुसरा मुद्दा येतो.आपलं क्युबामध्ये काय ध्येय आहे? आपल्याला काय हवं आहे? आपल्याला लोकांचा आनंद हवा आहे की नको? आपण क्युबाच्या संपूर्ण आर्थिक मुक्तीसाठी लढत आहोत की नाही? आपण कोणत्याही लष्करी गटाशिवाय,कोणताही अंतर्गत किंवा विदेशी निर्णय घेण्यासाठी पृथ्वीवरच्या कोणत्याही मोठ्या शक्तीच्या दूतावासाच्या सल्ल्याशिवाय,इतर अनेक मुक्त देशांप्रमाणे आपला देश मुक्त करण्यासाठी लढत आहोत का? आपण ज्यांच्याकडे जास्त आर्थिक सुबत्ता आहे त्यांच्याकडून ज्यांच्याकडे अजिबात नाही अशांना परत वाटप करण्याबद्दल विचार करत आहोत का? आपण कलात्मक कामाबद्दल,रोज आनंद देणाऱ्या गोष्टी करण्याबाबत विचार करत आहोत का? जर करत असू,तर आपल्याकडे आधीच आपली ध्येयं आहेत. मोठ्या धोक्याच्या वेळेस,मोठ्या चिंतेच्या वेळेस आणि मोठ्या निर्माणाच्या वेळेस जे काही ग्राह्य धरले जाते ते म्हणजे मोठे शत्रू आणि मोठी ध्येयं.जर आपण सहमत असू तर आपल्याला माहीत आहे की आपल्याला कुठे जायचं आहे,नंतर आपल्याला आपलं काम सुरू करायचं आहे.


मी सांगत होतो की क्रांतिकारी बनण्यासाठी क्रांती होणं गरजेचं आहे.आपल्याकडे ती आधीच झाली आहे. आणि क्रांतिकारी व्यक्तीला हेदेखील माहीत असायला हवं की त्याला किंवा तिला कोणत्या लोकांसोबत काम करायचं आहे.मला असं वाटतं की आपण अजूनही एकमेकांना व्यवस्थित ओळखत नाही.

आपल्याला अजूनही थोडा प्रवास करायला हवा आहे. जर आपल्याला ध्येय माहीत असेल,आपला शत्रू माहीत असेल आणि जर कुठे प्रवास करायचा आहे ती दिशा माहीत असेल,तर बाकी फक्त उरते,ते म्हणजे


रोजचा रस्ता माहीत असणं आणि त्यावर चालणं. कोणीही त्या रस्त्याकडे बोट दाखवू शकत नाही,तो रस्ता प्रत्येकाचा वेगळा असतो,हा तो रस्ता आहे ज्यावरून तो किंवा ती रोज प्रवास करत असतात,रोज वेगवेगळ्या अनुभवांना सामोरे जात असतात आणि आपल्या व्यावसायिक जीवनात त्याचा अवलंब करत असतात, लोकांच्या चांगल्यासाठी ते समर्पित असतात.


जर आपल्याकडे आधीच हे पैलू असतील,ज्यांद्वारे आपल्याला भविष्याकडे वाटचाल करायची आहे,तर मग चला जोसर्तीमाच्या एका वाक्याचं स्मरण करू या, 'जे सध्या माझ्या आचरणात आलं नसलं,तरी ते आपण आपल्या आचरणात आणलं पाहिजे', 'सांगण्याचा उत्तम मार्ग म्हणजे करणं.' आणि चला तर मग... क्युबाच्या भविष्याकडे वाटचाल करू या.


समाप्त..

२९/१/२६

माझ्या वातावरणातला मुलगा / A boy in my environment

'द मोटरसायकल डायरीज' लिहिल्यानंतर आठ वर्षांनी अर्नेस्टो चे गव्हेरा क्युबाच्या क्रांतिकारी सरकारमध्ये मध्यवर्ती व्यक्ती झाला होता.अल्बर्टो ग्रॅनाडोसोबतच्या आपल्या प्रवासानंतर,त्यानं पुन्हा लॅटिन अमेरिकेचा प्रवास केला,ग्वाटेमालामध्ये सीआयए समर्पित बंडाचा अनुभव घेतला आणि क्युबाच्या क्रांतिकारी चळवळीत सामील झाला.त्यामुळे शेवटी १९५९ मध्ये त्याला सत्ता मिळाली.क्युबामधले वैद्यकीय विद्यार्थी आणि कामगार यांच्या समोर दिलेल्या भाषणाचा प्रभाव हा त्याच्या स्वतःच्या वैद्यकीय विद्यार्थी ते राजकीय कार्यकर्त्यापर्यंतच्या प्रवासावर पडला.


जवळजवळ सगळ्यांना माहीत आहे की,अनेक वर्षांपूर्वी मी माझं आयुष्य डॉक्टर म्हणून सुरू केलं होतं.'डॉक्टर' म्हणून सुरुवात केल्यावर मी औषधांचा अभ्यास करायला सुरुवात केली.तेव्हा मी आज धारण केलेल्या बहुतेक संकल्पना माझ्या आदर्शाच्या भांडारात गैरहजर होत्या.


परिशिष्ट : वैद्यकीय विद्यार्थ्यांसमोर भाषण,अर्नेस्टो चे गव्हेरा,द मोटरसायकल डायरीज,अनुवाद - अमृता देशपांडे,मधुश्री पब्लिकेशन


प्रत्येकालाच व्हायचं असतं.तसं मलाही यशस्वी व्हायचं होतं.मी खूप प्रसिद्ध संशोधक व्हायचं स्वप्न बघितलं होतं.खरोखरच मानवतेला धरून असेल असं काहीतरी साध्य करण्यासाठी मी अथक परिश्रम घ्यायचं स्वप्न पाहिलं.पण हे त्याच वेळी शक्य असेल.ज्या वेळी आपला स्वतः चा विजय होईल.मी.जसे आपण सर्वच आजूबाजूच्या परिस्थितीची मुलं आहोत,मीपण होतो.


विशिष्ट परिस्थितीमुळे आणि कदाचित माझ्या स्वभावामुळे पदवी मिळाल्यानंतर मी लॅटिन अमेरिकेतून प्रवास करायला सुरुवात केली.आणि मला हे देश जवळून बघता आले.डॉमिनिकन सोडल्यानंतर मी अमेरिकेतल्या एकूणएक गावांना भेट दिली आहे.


जसा मी आधी विद्यार्थी आणि नंतर डॉक्टर म्हणून प्रवास केला,तसा माझा गरिबी,भूक,रोगराई,कमी संशोधनामुळे मुलांना बरं करण्याची कमतरता यांच्याशी जवळून संबंध येत गेला आणि मला एक विशिष्ट प्रकारचा सुन्नपणा आला.तिथं मूल गमावणं ही फार मोठी गोष्ट नव्हती.आपली मातृभूमी,लॅटिन अमेरिकेतही वाईट परिणाम झालेल्या वर्गामध्ये हे घडत आलं आहे. आणि त्यावेळी मला असं जाणवायला लागलं की,हे प्रसिद्ध संशोधक होण्या इतकंच किंवा वैद्यकीय शास्त्रात महत्त्वपूर्ण योगदान देण्याइतकच महत्त्वाचं आहे आणि यातून लोकांना मदत होत होती.


पण आपल्या सगळ्यांप्रमाणे मीही परिस्थिती चा मुलगा म्हणून जगत होतो आणि मला त्या लोकांना माझ्या वैयक्तिक प्रयत्नांतून मदत करण्याची इच्छा होती.मी आधीच भरपूर प्रवास केला होता.तेव्हा मी ग्वाटेमालामध्येच होतो आणि मी डॉक्टरांना मार्गदर्शक ठरतील अशा नोट्स काढायला सुरुवात केली होती. 


क्रांतिकारक डॉक्टर होण्यासाठी मला काय आवश्यक आहे याचा शोध घ्यायला मी सुरुवात केली.तरी हा हल्ला झाला,(१९५४) युनायटेड फ्रूट कंपनीने केलेले यूएस स्टेट डिपार्टमेंट सीआयएचे निर्देशक, फॉस्टर डलस आणि कॅस्टीलो आर्मास या त्यांच्या हातातल्या कठपुतळीने,या साऱ्यांनी सत्तांतराचा डाव साधला.ते सगळे एक सारखेच आहेत. (त्यानं अर्बेंझची जागा घेतली) क्युबाचे लोक अजून परिपक्वतेच्या पातळीवर पोहोचले नाहीत हे लक्षात घेऊन मी आक्रमक झालो आणि एका चांगल्या दिवशी बरेच जण पळून जाण्याचा मार्ग स्वीकारतात तसंच मीही ग्वाटेमालामधून निसटून जाण्याचा मार्ग स्वीकारला. कारण ती माझी जन्मभूमी नव्हती.


मग मला एक मूलभूत गोष्ट जाणवली.क्रांतिकारक डॉक्टर होण्यासाठी किंवा क्रांतिकारक होण्यासाठी प्रथम क्रांती होणं आवश्यक असतं.अलिप्त प्रयत्न, वैयक्तिक प्रयत्न,आदर्शाची शुद्धता,संपूर्ण आयुष्य आदर्शाच्या श्रेष्ठांना अर्पण करण्याची इच्छा म्हणजे लॅटिन अमेरिकेच्या कोपऱ्यात शत्रूचं सरकार आणि प्रगतीच्या विरुद्ध असणाऱ्या सामाजिक परिस्थितीविरुद्ध लढणं,असे प्रयत्न केले तर काही उपयोग नाही.


आपल्या क्युबात क्रांती होणं गरजेचं होते. त्यासाठी ज्यांना शस्त्रांचा वापर आणि लढण्याचा सराव आहे,ज्यांना शस्त्रांची किंमत आणि माणसांच्या एकीत किती ताकद असते हे माहीत आहे,अशा सगळ्यां लोकांना एकत्र करणं गरजेचं होतं.


म्हणजे मग आपण आज आपल्या समोर असलेल्या समस्येच्या गाभ्यात शिरतो.आपल्याकडे आधीपासूनच हक्क आहेत आणि इतर कोणत्याही गोष्टींपूर्वी कर्तव्य आहे,एक क्रांतिकारी डॉक्टर एक अशी व्यक्ती आहे जी आपल्या व्यवसायाचे तांत्रिक ज्ञान लोकांच्या सेवेत ठेवते.आता आपण पूर्वीच्या प्रश्नाकडे परत येऊ.एखादी व्यक्ती वैयक्तिक प्रयत्नांना समाजाच्या गरजांना कशी जुळवते?आपल्या प्रत्येकाचे आयुष्य कसे होते,आपण प्रत्येकाने डॉक्टर म्हणून किंवा इतर कोणत्याही सार्वजनिक आरोग्य कार्यक्रमात क्रांतीपूर्वी आपण कसं काम केलं हे आपल्याला पुन्हा आठवायचं आहे. 


आपल्याला ते परत उत्साहानं करावं लागेल.त्यानंतर आपण असा निष्कर्ष काढू की,त्यापूर्वीच्या युगात आपण जे काही विचार लादले होते ते सर्व दूर केले पाहिजेत आणि एक नवीन प्रकारचा माणूस निर्माण केला पाहिजे,जो नवीन क्युबाचं प्रतिनिधित्व करेल.मग जरा सोपं होईल.


क्युबामध्ये एक नवीन प्रकारचा मनुष्य तयार होत आहे, हे तुमच्यासाठी चांगले आहे.हे हॅवानामधल्या रहिवाशांसाठी चांगले आहे;पण ही कल्पना पचवायला इतरांना अवघड जाऊ शकतं.राजधानीत पूर्णपणे कौतुक केलं जाऊ शकत नाही,पण जे इतर कोपऱ्यांत दिसू शकतं.तुमच्यापैकी जे २६ जुलै रोजी सिएरा मेस्त्राला गेले होते,त्यांनी नक्कीच काहीतरी महत्त्वाचं पाहिलं असेल.तुम्ही अशी मुलं पाहिली असतील जी उंचीने ८-९ वर्षांची असल्यासारखी वाटतात.पण ती खरंतर १३-१४ वर्षांची असतात.

ती सिएरा मेस्त्राची खरी मुले आहेत,भुकेली मुले आहेत आणि सर्व प्रकारच्या गरिबीचे,कुपोषणाचे ते बळी आहेत.


या लहान क्युबामध्ये चार-पाच दूरचित्रवाहिन्या,शेकडो रेडिओ स्टेशन्स आहेत,इथे आधुनिक विज्ञानानं प्रगती केली आहे,तिथे जेव्हा एका रात्रीही मुलं शाळेत आली आणि त्यांनी विजेचा प्रकाश पाहिला तेव्हा त्यांना ते खूप तारे चमकत असल्यासारखेच वाटले! तुमच्यापैकी काही जणांनी त्या मुलांना पाहिलं असेल जी आता सामूहिक शाळांमध्ये शिकतात.अबकडपासून ते व्यापार सुरू करण्यापर्यंत अगदी क्रांतिकारक होण्यापर्यंतचे ज्ञान ते शिकताहेत.ही क्युबामध्ये जन्माला येत असलेली नवीन पिढी आहे.ती दुर्गम अशा ठिकाणी जन्माला येत आहे, जिथे सहकारी कार्यस्थळं आहेत. 


आजच्या आपल्या चर्चेच्या विषयाशी या सर्वांचा खूप संबंध आहे.डॉक्टर आणि इतर वैद्यकीय कामगारांचे क्रांतिकारी चळवळीत एकीकरण आहे.कारण मुलांना प्रशिक्षण देणं,त्यांचं पोषण करणं,शिक्षण देणं हे क्रांतीचं कार्य आहे.जमीनदारांच्या अनुपस्थितीत त्यांच्या जमिनीचं वाटप करण्याचं काम,रोज फळाची अपेक्षा न करता त्याच जमिनीवर घाम गाळणं हे अतिशय चांगलं काम क्युबामध्ये घडलं आहे.


रोगाविरुद्धची लढाई निरोगी शरीर निर्माण करण्याच्या तत्त्वांवर आधारित असावी.कमकुवत भागावर डॉक्टरांनी केलेल्या कलात्मक कार्यावर नाही;तर एकत्रितपणे विशेषतः सामाजिक एकत्रीकरणावर असावी.


एक दिवस औषध हे असे शास्त्र बनलं पाहिजे जे रोगांना प्रतिबंध करेल,जे संपूर्ण जनतेला त्यांच्या वैद्यकीय जबाबदाऱ्यांकडे वळवेल,जो नवीन समाज आपण बनवत आहोत त्यात केवळ तातडीची शस्त्रक्रिया करण्यासाठी किंवा काहीतरी असामान्य असे हाताळण्यासाठी हस्तक्षेप करावा लागेल.त्या संघटनात्मक कार्यासाठी,सगळ्यां क्रांतिकारी कार्यासाठी जी मूलभूत जरुरी असते,ती म्हणजे एक व्यक्ती.क्रांती ही एकामुळे होत नाही तर ती सामूहिक इच्छाशक्तीचा, सामूहिक पुढाकाराचा परिणाम असते.पण त्यातला विरोधाभास म्हणजे,ही माणसाच्या वैयक्तिक क्षमतेला मुक्त करणारी असते.


तथापि, क्रांती काय करत असेल तर ते म्हणजे,त्या क्षमतेला दिशा देण्याचे काम.आपलं आजचं काम वैद्यकीय व्यवसायातल्या सर्जनशील प्रतिभेला सामाजिक कार्याकडे वळवणं हे आहे.


एका युगाच्या अस्तापाशी आपण आहोत,केवळ क्युबात असं नाही.सगळा विरोधाभास असूनही,काही लोकांच्या आशा असूनही,जे काही भांडवलशाहीचे प्रकार आपण पाहिले आहेत ज्यात आपण वाढलो आणि ज्याने ग्रस्त झालो ते आता जगात सगळीकडेच पराभूत होताहेत. एकाधिकारशाहीचा पराभव होतोय.


सामाजिक शास्त्राचा प्रत्येक नव्या दिवशी विजय होतोय आणि आफ्रिका आणि आशियाच्या इतर अधीन खंडांमध्ये काही काळापूर्वी सुरू झालेल्या मुक्ती चळवळीच्या लॅटिन अमेरिकेत मोहरा असल्याचा अभिमान आणि आत्मत्यागाचे कर्तव्य आमच्याकडे होते.गहन सामाजिक बदल लोकांच्या मानसिकतेमध्येसुद्धा गहन बदलाची मागणी करतात.

व्यक्तीची सामाजिक वातावरणात स्वतःची अशी वेगळी अलिप्त क्रिया असते


असा व्यक्तिवाद क्युबामधून नष्ट व्हायला हवा. सामाजिक फायद्यासाठी व्यक्तिवादामध्ये उद्या प्रत्येक व्यक्तीचा पुरेपूर वापर झाला पाहिजे.पण आज जरी हे सगळं समजत असलं,मी सांगत असलेल्या सगळ्यां गोष्टी समजत असल्या आणि जरी सगळ्यांची वर्तमान, भूतकाळ आणि भविष्याबाबत विचार करण्याची इच्छा असली,तरी विचार करण्याची पद्धत बदलण्यासाठी - सखोल अंतर्गत बदल आवश्यक आहेत आणि गंभीर बाह्य बदल प्रामुख्यान सामाजिक बदल घडवून आणल्यानं यात मदत होईल.


…अपुरे राहिलेला भाग पुढील लेखामध्ये…!!