* विजय गायकवाड | Vijay Gaikawad

live

नमस्कार आपले स्वागत आहे. मी पुस्तके आणि मित्रांवर पैसे खर्च करतो,माझ्याकडे दगड आणि विटांवर खर्च करण्यासाठी पैसे नाहीत.- रस्किन बाँड.ही थोर माणसं व त्यांचे विचार मला पुस्तकात भेटलीत.ती भेटली आणि त्यांनी सांगितले कि, प्रत्येक दिवशी असं काही तरी करा की,ते तुम्हाला अधिक सुंदर उद्याच्या दिशेने खूप लांबवर घेऊन जाईल."- डोग फायरबाऊ.' सर्वियन कादंबरीकार मिलोराद पावीच यांचे एक वाक्य आहे ते म्हणतात - जोवर जगात पुस्तक वाचणाऱ्या वाचकांची संख्या बंदूकधारी सैनिका पेक्षा अधिक आहे तोवर काळजीच काहीच कारण नाही.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात.पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये.म्हणून अविरतपणे प्रयत्न करणारे मार्गदर्शक, मित्र धावून येतात.प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,डॉ.दीपक शेटे,आ.भरत बुटाले,प्रा.सर्जेराव राऊत,सुभाष ढगे,अनिल फारणे,डॉ.सुधीर सरवदे ,विश्वास खाडे, विनायक पाटील,संजय कुंभार,सतीश खाडे,मनोहर सुर्वे,गणेश खंदारे,तात्या गाडेकर, दादासाहेब गाडेकर, दादासाहेब ताजणे, पुस्तकातील घटना प्रसंग सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील यांनी केलेले आहे. मला लिहिण्याची प्रेरणा देणारी पुस्तके,लेखक,प्रकाशक,मित्र ही जगावेगळी माणसं माझ्या जीवनातील महत्वाचा टप्पा आहेत.... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ.मेघा गायकवाड, चिरंजीव मयान,माझ्या धावण्यातील गुरुवर्य नामदेव बरुरे,लुल्ला शेख मोठी ताई ,लहान ताई जयश्री शिंदे या सर्वांचेच मनापासून आभार व धन्यवाद मॅट्रिक फेल विजय गायकवाड

२६/२/२६

Great man Bapuji

कोणत्याही देशाच्या इतिहासात गांधीजींना स्वतःच्या जीवनात मिळालेले पूर्णत्व कचित इतरांच्या वाट्याला आले असेल ! जणू ते लिव्हिंग लिजंडच होते !


बापूजींनी ज्या गोष्टीला स्पर्श केला तिला मौलिकता प्राप्त झाली.त्या गोष्टींचे सोने झाले ! त्यांच्या कल्पनेप्रमाणे त्यांनी प्रारंभ केलेल्या कार्यात पूर्णता मिळालेली नाही असे जरी त्यांना वाटत होते तरी त्यांच्या कार्यात त्यांना भरपूर यश मिळाले.गीतेच्या तत्त्वज्ञानाप्रमाणे फलाची अपेक्षा न करता त्यांनी कार्य केले आणि फळ त्यांच्या पाठीमागे धावत आले.त्यांचे दीर्घ जीवन,त्या जीवनात त्यांनी केलेली कष्टाची कामे, ठराविक चाकोरीच्या जीवनक्रमातूनच त्यांनी केलेले विलक्षण धाडसी प्रयोग या सर्वांकडे दृष्टी टाकल्यानंतर त्यांच्या जीवनक्रमात कुठेही कसलाही विसंवादी स्वर ऐकू येत नाही.त्यांचे विविध क्षेत्रातले कार्य म्हणजे जणू काय स्वरैक्य.त्यांचा प्रत्येक शब्द व हालचाल म्हणजे जणू स्वरमालिका ! त्यांनी ज्या जीवनक्रमाची निवड केली तो जीवनक्रम जगाच्या रूढीपेक्षा भिन्न असला तरी त्यांनी जीवनाची कला आत्मसात केल्यामुळे नकळत ते एक संपन्न कलाकार झाले ! सत्याच्या व चांगुलपणाच्या शोधानेच मानवी जीवनाला कलेचा आकार मिळत जातो.


शक्तिमान आत्मा


गांधीजी जसजसे वृद्ध होत जाऊ लागले तसतसे त्यांचे शरीर म्हणजे त्यांच्या शरीरात वास करीत असलेल्या शक्तिमान आत्म्याचे ते एक कार्यवाहू साधन आहे याचा प्रत्यय येऊ लागला.त्यांचे भाषण आपण ऐकू लागलो, त्यांच्याकडे दृष्टी टाकली की त्यांच्या शरीराचा आपणांस विसर पडू लागला,व ते जिथे स्थानापन्न झाले ते मंदिर व त्यांनी पाऊल टाकले ती पवित्र भूमी असे आपणांस वाटू लागले!


पंडित जवाहरलाल नेहरू,संकलन: ह. वि. देसाई,गांधी नावाचे महात्मा,संपादन - रॉय किणीकर,सहाय्यक - अनिल किणीकर,

डायमंड पब्लिकेशन


त्यांच्या मृत्यूतदेखील उज्वलता,विकलात्मकता होती. बापूजी ज्या प्रकारचे जीवन जगले त्या जीवनाच्या दृष्टीने विचार करता त्यांचा मृत्यू हा त्यांच्या जीवनक्रमाचा कळस आहे असे सर्वार्थाने म्हणता येईल. सामर्थ्याची पूर्ण सूत्रे हाती असतानाच त्यांना मृत्यू आला! प्रार्थनेच्या क्षणी त्यांना मृत्यू आला याचे निःसंशय त्यांना समाधान वाटले असेल! ज्या ऐक्यासाठी त्यांनी आपल्या संबंध आयुष्यात अविरत कार्य केले,सारे जीवन वाहून घेतले व आयुष्याच्या अखेरीलाही त्यांनी आपली निष्ठा सोडली नाही त्या निष्ठेच्या परिपूर्णतेसाठी त्यांनी हौतात्म्य पत्करले ! क्षणात मृत्यू यावा असे साऱ्यांना वाटते,तसाच डोळ्याचे पाते लवते न लवते तोच त्यांना मृत्यू आला! वयोमानाने अगर आजाराने शरीर कोमेजून जाते, निस्तेज होते अगर मनाला विस्मृती येते असे काही त्यांच्या बाबतीत झाले नाही.त्यांच्या शक्तीचा परमोत्कर्ष झालेला असतानाच त्यांना मृत्यू आला.आमच्या मनात व ज्या युगात आपण राहात आहोत त्या युगाच्या मनोमनी त्यांनी जे चित्र निर्माण केले आहे ते कधीच पुसले जाणार नाही.


ते चित्र तर कधीच पुसट होणार नाही.पण गांधीजींनी त्यापेक्षाही मोठी किमया घडवून आणलेली आहे.त्यांनी आमच्या मनाचा व बुद्धीचा ठाव घेऊन त्यांना वळण लावले.त्यांच्या कर्तृत्वाच्या काळात घडलेली पिढी काळाच्या प्रवाहात गडप होईल.पण त्यांनी या पिढीला जी शिकवण दिली ती शिकवण या नंतरच्या अनेक पिढ्यांना मार्गदर्शक ठरेल.कारण गांधीजींनी दिलेली शिकवण ही भारताच्या आत्म्याचा एक भाग होऊन बसलेली आहे.ती भारताची अस्मिता आहे!


राष्ट्रीय वारसा


बापूजींनी भारताच्या राजकीय क्षितिजावर पदार्पण केले ते आम्हाला संपन्न करण्यासाठी,आम्हाला समर्थ बनविण्यासाठी.पण त्यांनी आम्हाला जे सामर्थ्य दिले ते एक क्षणाचे,एक दिवस पुरणारे,वर्षभर टिकणारे नसून त्या सामर्थ्याने आपणास राष्ट्रीय वारसा प्राप्त झाला आहे.त्यांनी आपल्या देशासाठीच नव्हे तर जगासाठीही महान कामगिरी बजावलेली आहे.तीसुद्धा विलक्षण प्रभावाने.आता त्यांनी जी कर्तव्ये,जीवनपद्धती निश्चित केली आहे तिच्याशी प्रामाणिक राहून आपले कर्तव्य पार पाडण्याची जबाबदारी आपल्यावर आहे.आपण आता कर्तव्यपराङ्‌मुख होता कामा नये.त्यांच्या स्मृतीची आपणास कधी विस्मृती पडता कामा नये.आपण देशकार्याच्या बाबतीत जी प्रतिज्ञा घेतलेली आहे,ज्या प्रतिज्ञेचा आपण वारंवार पुनरुच्चार करतो ती प्रतिज्ञा साकार करण्यासाठी आपण आपल्या प्रयत्नांची व आपल्या शक्तीची पराकाष्ठा करायला हवी.


अशक्त शरीराच्या या छोट्या माणसाच्या शरीरात काहीतरी पोलादासारखे होते.कोणत्याही महान शक्तीपुढे त्यांचे ते शरीर नमले नाही.त्यांच्या चेहऱ्यात देखणेपणा नसला,त्यांनी कमरेला छोटेसे वस्त्र गुंडाळलेले असले तरी त्यांच्याकडे पाहताच आपण त्यांच्या राजेशाही तेजाने दिपून जात होतो,त्यांच्यापुढे आपण विनम्र होत होतो.आणि ज्या वेळी गांधीजी कोणतीही आज्ञा करीत असत त्या वेळी ती आज्ञा मानावीच लागे.त्या बाबतीत ते कुणाचीही गय करीत नसत.त्यांचे शांत,सखोल डोळे इतरांच्या अंतःकरणात भावनात्मक प्रतिसाद निर्माण करीत.त्यांच्या भाषणाच्या वेळी एखादा प्रेक्षक असो अगर हजारो प्रेक्षक असोत इतकी छाप पडे की,प्रत्येक जण गांधीजींशी तद्रूप होई. त्यांच्या भाषणाने श्रोते मोहित होतात,समरस होतात याचे कारण गांधीजींच्या वक्तृत्वशैलीने अगर शब्दावडंबराने ते भारले जातात असे नव्हे तर त्यांची भाषा साधी सोपी असते,त्यात मुळीच पाल्हाळ नसतो, त्यात एखादासुद्धा अनावश्यक शब्द नसतो.

निर्विवाद प्रामाणिकपणा,व्यक्ती वैशिष्ट्य यांचा लोकांवर प्रभाव पडतो.त्यांचे भाषण ऐकताना या छोट्या मूर्तीत प्रचंड आंतरिक सामर्थ्य असल्याचा प्रत्यय येतो.लोकांच्यावर प्रभाव पाडणे व प्रतिस्पर्थ्यांना जिंकणे ही गांधीजीची शक्ती विलक्षण आहेगांधीजी जितके नम्र होते तितकेच तत्त्वाचा प्रश्न आला तर कठोर व कणखर होते.


जितके मधुभाषी तितकेच तत्त्वाच्या बाबतीत कधी नमते न घेणारे,तितकेच प्रत्येक बाबतीत प्रामाणिक.त्यांचे डोळे दिसायला शांत पण त्या नेत्रांत निश्चयाची व शक्तीची ज्योत सतत तेवणारी!त्यांचा आवाज शांत स्वरुपाचा,कधी न चढणारा.लक्षावधी लोकांच्या गोंगाटात तो आवाज साऱ्यांना ऐकू येणारा! त्यांच्या शांत व मधुर आवाजात कुठे तरी पोलादाचा रस दडवला असावा! त्यांच्या आवाजात सभ्यतेचे व विनम्रतेचे मिश्रण झालेले होते.

तरीही त्या आवाजात भीती वाटावी इतकी गंभीरता सामावलेली होती.प्रत्येक शब्दात अर्थपूर्णता व काटेकोर आस्थेवाईकपणा.पण त्यांच्या प्रत्येक शांततेच्या व मैत्रीच्या शब्दांत ओतप्रोत सामर्थ्य सामावलेले होते व त्या प्रत्येक शब्दांत अन्यायाचा प्रतिकार करण्याच्या निश्चयाची नि कृतीची शक्ती प्रतीत होत होती.


गांधीजी : एक कोडे


गांधीजी हे एक कोडे आहे,गूढ प्रश्न आहे.ती ब्रिटिश सरकारपुढे एक समस्या होती असे नव्हे तर त्यांचे स्वकीय नि सहकारी यांच्यापुढेही ती एक समस्याच होती.भारताखेरीज अन्य देशांत गांधीर्जीसारख्या धार्मिक द्रष्ट्याला काही स्थान मिळाले नसते.पण भारत अजूनही अशा धर्मात्म्याची भाषा समजू शकतो. म्हणूनच गांधीजी पापपुण्याच्या,सत्याच्या नि अहिंसेच्या गोष्टी बोलू शकले.

भारतीय पौराणिक काळात अशा संन्यस्त महापुरुषांच्या असंख्य गोष्टी असून या महापुरुषांनी आपल्या त्यागी जीवनाने नि तपः सामर्थ्याचा पर्वत निर्माण करून देवादिकांनाही हालविले आहे!आध्यात्मिक हानीच्या जलसंचयातून निर्माण झालेल्या गांधीजींच्या विलक्षण सामर्थ्याचा प्रत्यय येताच मला नेहमी पुराणकालातील महापुरुषांच्या चमत्कारांची आठवण येते.गांधीजी हे या जगातले साधेसुधे नाणे नव्हते,हे वेगळ्या पद्धतीचे,धातूचे,नाणे होते.त्यांच्या नेत्रातून नेहमी कुणीतरी 'अज्ञात' आमच्याकडे टवकारून पाहत होता !


अबाधित मोहकपणा,गूढ सामर्थ्य यांचा लोकमतावर प्रभाव पाडणारे गांधीजी लोकविलक्षण होते.गांधीजींचे लेखन अगर त्यांची सुभाषिते यावरूनही या लेखनाच्या मागे असणाऱ्या गांधींच्या स्वभावाची अगर त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची काही कल्पना येत नाही. गांधीजींनी देशाची जी सेवा केली आहे,ती किती अभूतपूर्व! त्यांनी आपल्या देशबांधवांच्या अंतःकरणात धैर्य व पौरुषत्त्व निर्माण केले.त्यांनी जनतेला अहिंसा व सहनशीलतेची शिकवण दिली.त्यांनी लोकांना ध्येयासाठी आनंदाने त्यागाची परिसीमा गाठण्याची शिकवण दिली व त्यांच्यांत अभिमान निर्माण केला.धैर्य हा चारित्र्याचा प्रबल पाया आहे असे त्यांचे स्पष्ट मत होते. त्यांनी एकदा असे उद्‌गार काढले होते,"धैर्याखेरीज जीवनात नैतिकता, धर्म व प्रेम यांना स्थान नाही. भीतीच्या भावनेतून सत्याचा अगर प्रेमाचा मार्ग दिसत नाही!" हिंसेपेक्षाही भ्याडपणा तिरस्करणीय आहे असे त्यांनी एकदा आम्हाला बजावले होते.माणसाला काही ध्येय गाठायचे असले तर शिस्त ही त्या कार्याची प्रतिज्ञा व हमी आहे! त्याग,शिस्त अगर मनोनिग्रह यांखेरीज मानवजीवनात अन्य मुक्ती नाही,शिस्तीखेरीज निव्वळ त्याग निरर्थक आहे असे गांधीजींचे स्पष्ट मत होते.


पुनरुज्जीवनाचा हेतू


गांधीजींशी ज्यांची प्रत्यक्ष ओळख नव्हती व ज्यांनी त्यांचे फक्त लिखाणच वाचलेले होते त्यांना गांधीजी म्हणजे एखाद्या धर्मोपदेशकासारखे कडक धोरणाचे, लांबट चेहऱ्याचे,

धर्मोपदेशकाप्रमाणे काळा झगा घालून फिरणारे असावेत असे वाटणे साहजिक आहे.पण गांधीजींच्या लेखनावरून त्यांच्या स्वभावाची पारख करणे अन्यायाचे ठरेल,गांधीजींनी जे लेखन केले त्यापेक्षाही ते फार मोठे होते.त्यांनी केलेल्या लिखाणावर टीका करून त्यांच्या मोठेपणाचे मूल्यमापन करता येणार नाही.त्यांचे हास्य जितके आनंददायक वाटत असे तितकेच ते परिणामकारक होते व त्या हास्यातून मनाच्या मोकळेपणाचा प्रत्यय येत असे.

त्यांच्या स्वभावात बालकाचा निर्व्याजपणा दिसत असे.मुलाच्या स्वभावातल्या मोहकपणाचाही त्यांच्या स्वभावात प्रत्यय येत असे.त्यांनी एखाद्या ठिकाणी प्रवेश केला की त्यांच्या पदार्पणासमवेत स्वच्छ वाऱ्याची झुळूक येऊन तिथले वातावरण तेजाळून टाकीत असे.गांधीजी नैसर्गिक सौंदर्याची वाखाणणी करीत असत तरी मानवनिर्मित सौंदर्याविषयी अगर कलेविषयी त्यांना फारशी कदर,आस्था नव्हती.पण त्यांनी आपल्या जीवनपद्धतीत आपल्या कल्पनेप्रमाणे जीवनसौंदर्य निर्माण केले होते.त्यांच्या प्रत्येक वागणुकीत अर्थ, सौंदर्य होते व कृत्रिमतेचा पूर्ण अभाव होता.


राष्ट्रीय चळवळीतही गांधीजींनी धार्मिकतेवर व आध्यात्मिकतेवर भर दिला.पण त्यांच्या धर्माच्या कल्पनेत ठोकळेबाजपणा अगर हटवादीपणा नव्हता. त्यांची जीवनाकडे पाहायची दृष्टी धार्मिकतेवर आधारलेली होती व त्यांच्या चळवळीवरही धार्मिक भावनेचा प्रभाव होता.तसेच सर्वसाधारण जनतेच्या हितसंबंधाच्या दृष्टीने गांधीजींच्या धोरणात पुनरुज्जीवनाचाच हेतू प्रामुख्याने सामावलेला होता. राजकारणात हिंदूंची अगर मुसलमानांचीही बाजू मांडताना धार्मिक प्रवृत्तीवर जो भर दिला जात होता त्याचे मला फार दुःख होत होते.हे धोरण मला मुळीच आवडत नव्हते.

मौलवी,मौलाना व स्वामी लोक आपल्या भाषणांत जाहीरपणाने ज्या घोषणा करीत असत त्या मला अत्यंत दुर्दैवी वाटत होत्या.

त्यांचे इतिहासाचे, समाजकारणाचे व अर्थशास्त्राचे ज्ञान मला अगदी चुकीचे वाटत होते आणि प्रत्येक गोष्टीला जे धार्मिक वळण दिले जात होते,त्यामुळे स्पष्ट विचारसरणीला पायबंद पडतो असे मला वाटत होते.गांधीजींचे काही विचारही मला विसंवादी वाटत असत.ते रामराज्याचा सुवर्ण युग म्हणून उल्लेख करीत असत व ते युग आपल्याला देशात निर्माण करावयाचे आहे असा वारंवार उल्लेख करीत असत.पण या बाबतीत गांधीजींशी वादविवाद करायला मी असमर्थ होतो.मी माझ्या मनाचे एवढेच समाधान करून घेत होतो की, रामराज्य हा शब्द लोकप्रिय आहे,लोकांना कळतो म्हणून गांधीजी त्या शब्दाचा उल्लेख करतात.कोणतेही विचार लोकांच्या अंतःकरणापर्यंत नेऊन पोहोचवायची त्यांना चांगली कला साधलेली होती.


गांधीजींचे व्यक्तिमत्त्व समजून घेणे अत्यंत कठीण होते. सर्वसाधारण आधुनिक माणसाला त्यांची भाषाही समजत नसे.गांधीजींना आम्ही ओळखू शकलो असे आम्हाला वाटत असे.ते महान नेते आहेत या जाणिवेने आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांच्या हाती काही काळापर्यंत तरी कोरा चेक दिला होता.


नैतिक अधिष्ठानावर जोर


राजकारणात व इतर क्षेत्रांतही आम्हा सर्वांवर गांधीजींच्या विचारसरणीचा प्रभाव पडलेला होता. धर्मांच्या क्षेत्रातही आम्ही या प्रभावापासून फारसे अलिप्त नव्हतो.या विचारसरणीचा आमच्यावर प्रत्यक्ष प्रभाव पडत नव्हता तरी अप्रत्यक्षपणे प्रभाव पडला. आमच्या विचारसरणीच्या संरक्षणाचे किल्ले ढासळून पडत असत.धर्माचे बाह्य मार्ग,पद्धती मला मुळीच मान्य नव्हत्या व धर्माच्या नावाखाली धर्मवीरांनी जनतेची जी पिळवणूक अगर बनवाबनवी चालविली होती त्याचा मला मनापासून तिटकारा वाटत होता.पण आमच्या चळवळीला नि सत्याग्रहाला तेच नैतिक अधिष्ठान होते. अहिंसेच्या धोरणास मात्र मी कधीच पूर्ण मान्यता दिली नाही.त्या धोरणाचे मला जरासे आकर्षण वाटले. भारतातील परिस्थिती,आमच्या रूढी नि त्यांची पार्श्वभूमी यांचा विचार करता सध्याच्या परिस्थितीत हे धोरण ठीक आहे असे मला वाटते.पण ते धोरण कायमचे असावे असे मला कधीच वाटले नाही.धर्माचा संकुचित अर्थ न करता राजकारणात धार्मिक मूल्यांना स्थान देण्याची कल्पना मला बरी वाटली.योग्य साधनांनी योग्य साध्य गाठणे काही वाईट नाही.हे धोरण मला नैतिक तत्त्वाचे वाटते इतकेच नव्हे तर या धोरणात व्यवहारी राजकारणाचे धोरण सामावले आहे असेही वाटते.कारण साधने योग्य नसली तर आपण मनात बाळगलेल्या साध्यात आपल्याला अपयश मिळते.अनेक समस्या नि अडचणी उपस्थित होतात.


गांधीजी हे मूलतः धार्मिक प्रवृत्तीचे गृहस्थ होते. ते अंतःकरणाने हिंदू होते,त्यांच्या अंतःकरणाच्या कोपऱ्यातही हिंदुत्व होते.पण त्यांच्या धर्माच्या कल्पनेत मुळीच ठोकळेबाजपणा नव्हता.धार्मिक विधींवर त्यांचा विश्वास नव्हता.गांधीजींची धर्माची कल्पना म्हणजे नैतिक नियम,सत्याचे नि प्रेमाचे नियम ! सत्य नि अहिंसा हे शब्द गांधींजी एकाच अर्थाने वापरीत असत. हिंदुधर्माचे मूलभूत तत्त्वज्ञान आपणास अवगत आहे असा त्यांचा दावा होता.तेव्हा ज्या धर्मग्रंथात त्यांच्या ध्येयवादी धर्मतत्त्वाशी न जुळणारे धर्मतत्त्व नसेल त्या धर्मग्रंथांत कुणी तरी आगंतुकपणाने प्रक्षिप्त मजकूर घुसडलेला आहे असे त्यांचे मत होते. "नैतिक पातळीवरून ज्या धार्मिक रूढीचे मी समर्थन करू शकत नाही अगर ज्या रूढीचे मला आकलन होऊ शकत नाही त्या रूढींचा नि रीतिरिवाजांचा मी गुलाम होऊ इच्छित नाही," असे गांधीजींनी एकदा जाहीर केले होते.


स्वतंत्र धोरण


आपल्या कल्पनेप्रमाणे व तात्त्विक भूमिकेप्रमाणे मार्ग पत्करण्याचे गांधीजींचे स्वतंत्र धोरण होते.या धोरणानेच ते आपल्या जीवनविषयक तत्त्वज्ञानाला मुरड घालीत असत.त्या तत्त्वज्ञानाचा विकास करीत असत.पण त्यांनी जी नैतिक मूल्ये निश्चित केली त्या अनुरोधानेच ते जीवनविषयक तत्त्वज्ञानाकडे पाहात असत.त्यांचे ते तत्त्वज्ञान योग्य होते की अयोग्य होते हा वादाचा मुद्दा असू शकेल पण हे मूलभूत मोजमाप ते प्रत्येक गोष्टीस व स्वतःलाही लावीत असत.राजकारणात व इतर बाबतीतही सर्वसाधारण माणसाला ही गोष्ट अडचणीची भासू लागली.त्यामुळेही गैरसमजही निर्माण झाला. बदलत्या परिस्थितीशी समन्वय साधण्याचा गांधीजींचा सतत प्रयत्न चालू होता.कोणत्याही अडचणीच्या परिस्थितीशी मिळते न घेता त्यांनी आपला सरळ मार्ग बदलण्याचा कर्धीही प्रयत्न केला नाही.त्यांनी ज्या सुधारणा सुचविल्या,जो उपदेश केला त्याची त्यांनी सरळ आपल्या जीवनात अंमलबजावणी केली.त्यांनी कोणत्याही सुधारणेची सुरुवात स्वतःपासून सुरू केली. आपल्या हातांवर हातमोजे घट्ट बसावे त्याचप्रमाणे गांधीजीचे शब्द नि कृती एकमेकात सामावून जात असत.म्हणूनच काहीही घडले तरी त्यांनी आपल्या मूलभूत धोरणातील प्रामाणिकपणा व एकात्मता कधी सोडली नाही.त्यामुळेच त्यांचे कार्य व जीवन यांचा पूर्ण मिलाफ झालेला दिसून येतो.त्यामुळे त्यांच्या जीवनात पराभवाचे ज्या ज्या वेळी प्रसंग आले त्या वेळीही त्यांचे व्यक्तिमत्त्व तेजाळल्याचा आपल्याला प्रत्यय आला.

त्यांच्या भारतासंबंधी कोणत्या कल्पना होत्या, कोणत्या ध्येयवादी कल्पनांनी त्यांना भारत घडवायचा होता.? 


अपुर्ण शिल्लक भाग पुढील भागात..

२४/२/२६

नारायणमामा / Narayan Mama

नारायणा,अरे,पाट घेऊन बसायचंस,जमिनीवर काय बसलास ?" ह्या माईंच्या सूचनेवर "माईसाहेब,जमीन नुक्तीच गाईच्या शेणाने सारवलेली दिसती आहे.त्या शेणाची ऊब अजूनही आहे." ह्या नारायणमामाच्या उत्तरावर सगळेच हसले.त्यातही बच्चे कंपनी जास्तच.आज मंदा,मुक्ता गप्पांचा मनसोक्त आनंद घेत होत्या. कारण यशाने त्यांना तिथे बसायची परवानगी दिली होती त्यामुळे ना आता मंदाला सतत यशाच्या नजरेचा धाक होता ना मुक्ताला नजर चोरण्याची गरज.


तासभर गप्पा झाल्यावर माई म्हणाल्या,"अरे,तुम्ही रात्रभराचा प्रवास करून आला आहात.नारायण,तू आणि मुलं मागे आडावर जाऊन दात घासा आणि आंघोळी करा.बंब चांगला रसरसतोय,मी नुक्तीच पाहून आलेय.यशा विसणाला आडाचं पाणी शेंदून देईल.शकू इथेच स्वैपाकघरातल्या मोरीत करील आंघोळ."


नाही तरी मुलांना मागच्या अंगणात बांधलेल्या लक्ष्मी-पार्वती बघायच्याच होत्या.त्यामुळे माईआत्यांची सूचना ऐकल्यावर सगळे मागच्या अंगणाकडे धावायला लागले.मामींनी त्यांना थांबवून टॉवेल,ब्रश आणि टूथपेस्ट घ्यायची आठवण केल्यावर सगळे थांबले.बॅगा उघडायला लागले.त्यांच्या बरोबरीने यशा-मंदा-मुक्ता मागेपुढे करत होते.आत्तापर्यंत पाव्हणे आल्याच्या आनंदात त्यांचं सामानाकडे लक्षच नव्हतं.पण आता त्यांचं लक्ष मामांनी आणलेल्या बॅगांकडे गेलं.


उन्हाळ्याच्या सुट्टीत आड आटला,गावात पाण्याचा टँकर सुरू झाला की,त्यांचा मुक्काम ठाण्याला अशोकभाऊकडे हले.त्यावेळी त्यांचं अवाढव्य सामान काळ्या रंगाच्या,वरून रिबिट मारलेल्या अवजड लोखंडी पेट्यांत असे.त्या पेट्यांमध्ये काय काय असे ? तर - भाजणी असे,सातूचं पीठ असे,कपडेही असत. बापूंच्या बैठकीच्या सतरंजीत हे सगळं शंकर न्हावी आणि बाबू तांगेवाला ह्यांच्या मदतीने घट्ट बांधून त्याची वळकटी केलेली असे.

नारायणमामाचं सामान कसं आटोपशीर होतं.शिवाय ते रंगीत बॅगांमध्ये भरलेलं होतं. त्या बॅगा रबरी होत्या की प्लॅस्टिकच्या कोण जाणे! आणखी विशेष म्हणजे त्यांना अंगचीच कुलपं होती. सगळंच नवल! येताना ते सगळे रिझर्व्हेशन करून आले होते म्हणे.म्हणजे एकदा का तुम्ही रिझर्व्हेशन केलं की, तुमच्या जागेवर कुणीच बसत नाही.रेशनच्या रांगेत आपला दगड ठेवून जागा अडवतात तसं.सगळं अजबच की!


उन्हाळ्याच्या सुट्टीत ठाण्याला जाताना मोठी सर्कसच असे.डायरेक्ट ठाण्याला गाडी नसायची.त्यामुळे पहिल्यांदा मनमाडला जाऊन तिथून ठाण्याची गाडी पकडावी लागे.

मनमाडपर्यंत शंकर पोहचवायला यायचा. हमाल दरवाजातून सामान आत नेई.बापू आणि शंकर हे दोघे यशा-मंदा-मुक्ताला खिडकीतून आत ढकलत नि आतले प्रवासी त्यांना बाहेर ढकलत.मधल्यामध्ये मुलांचं चांगलंच मर्दन होई.


मामांचं हे आटोपशीर सामान मुलं नवलाईने पाहत होती.मामांच्या मुलांनी बॅगांमधून आपली टूथपेस्ट,

ब्रश, टर्किश टॉवेल बाहेर काढले.साबणाची वडी बाहेर पडताच सगळी खोली सुगंधित झाली.ह्या सगळ्या गोष्टी जवळून पहिल्यांदाच पाहत असल्याने यशा आणि मुक्ता हजार प्रश्न विचारत होते.त्यात नवल आणि कौतुक होतं पण असूया किंवा लोभ नव्हता.मुक्ताने तर हळूच टर्किश टॉवेल वरून हात फिरवून पाहिला आणि यशाने साबणाचा वास नाकात भरून घेतला.


आंघोळीच्या वेळी माधुरीने ही गंमत आपल्या वडिलांना सांगितली.तेव्हा त्यांना जरा अवघडल्यासारखं झालं.


नारायणमामांनी यशाला विचारलं,"यशा,आवडला का रे तुम्हाला हा टॉवेल ?पुढच्या वेळी येताना तुम्हा तिघांसाठी असे तीन टर्किश टॉवेल घेऊन येईन आणि तिघांसाठी टूथपेस्ट नि ब्रशसुद्धा."


धाकट्या बहिणी काही बोलायच्या आतच यशा म्हणाला,"मामा, इथे गावात पाणी खूपच कमी असतं. एवढे मोठाले टॉवेल धुवायला पाणीपण खूप लागेल ना. त्यामुळे आम्ही वापरतो ते पंचे सोयीचे आहेत.आमच्या गुरुजींनी आम्हाला कोळशाच्या राखंडीत कापूर अन् तुरटी घालून त्याच दतमंजन करायला शिकवलं आहे. बोटाने दात घासले की,मागूनपुढून दात स्वच्छ होतात असं गुरुजी म्हणतात.तुम्हाला जाताना डबीभर देऊ का मी तयार केलेलं मंजन ? आवडेल तुम्हाला."मामाला आपल्या भाच्याच्या बोलण्याचं कौतुक वाटलं.अजितने विचारलं, "यशादादा, इकडे थंडी खूप आहे ना? गाल-ओठ फुटल्यावर


तुम्ही काय लावता ?"


मुक्ता पटकन म्हणाली, "अरे,आमच्याकडे कोकमाचे खडे किंवा तेल मिळतं.तेच आम्ही हातापायांना लावतो."


"कोकमामुळे अंग फुटत नाही आणि नरमपण राहतं." मंदाने पुष्टी जोडली


संध्याकाळी यशा,मंदा,मुक्ता ह्यांचं पाहुण्यांना घेऊन गावाबाहेरच्या तळ्यावर फिरायला जायचं ठरलं.गावात पाण्याचा दुष्काळ असल्याने गावच्या नगरशेटनी खूप वर्षांपूर्वी गावाच्या सोयीसाठी हे तळं बांधलं होतं.त्या तळ्याचा गावाला उपयोगदेखील होत असे.मे महिन्यात तळं कोरडंठाक पडेपर्यंत घरोघरीच्या विहिरींना-आडांना पाणी असे.दूरदृष्टी ठेवून शेटजींच्या कुटुंबीयांनी तळ्याच्या सभोवती चिंच,कडुलिंब,पिंपळ अशी झाडं लावली होती.अर्थात जंगली झुडपं अन् बाभळीचीही झाडं त्या परिसरात खूप होती.

गावच्या प्रेक्षणीय स्थळांपैकी गावाबाहेरचं हे तळं एक होतं.


घरून निघाल्यापासून गप्पांना नुसता ऊत आलेला होता.अजित यशाला क्रिकेटच्या आणि त्याच्या शाळेच्या गमती सांगत होता.मंदा आणि मुक्ता माधुरीशी हितगुज करत होत्या.मोन्या कधी ह्यांच्यात तर कधी त्यांच्यात शिरण्याचा प्रयत्न करत होता.मामा आणि मामी सगळ्यांच्या मागून गप्पा मारत रमतगमत येत होते. मोकळी जागा बघून सगळे बसले.अजित आणि यशा तळ्यात चपटे दगड फेकून गोल चाकोऱ्या काढायला लागले.


'आजूबाजूला बाभळीचे मोठमोठे काटे आहेत रे...' मामांनी सगळ्यांना सावध केलं.गावातला प्रसिद्ध भेळभत्ता बरोबर आणला होता.तो खाऊन झाल्यावर पुड्याचा कागद बघून मामांना त्यांचं बालपण आठवलं."शकू,आम्ही लहानपणी कशी भिरभिरं बनवायचो,ते दाखवतो हं!"मामांनी तो भेळीचा कागद,बाभळीचा काटा आणि तिथेच पडलेली बकरीची लेंडी घेऊन बघता बघता एक भन्नाट भिरभिरं बनवलं अन् मोन्याला खेळायला दिलं.


"अजित,आमच्या लहानपणी तुमच्यासारखे क्रिकेट वगैरे खर्चिक खेळ नव्हते.


सगळे खेळ बिनखर्चाचे !"


घरी येता येता मामा यशाला म्हणाले,"यशवंतराव,उद्या सकाळी आपण सगळेच कोटमगावला देवीच्या दर्शनाला जाऊ.माई-बापूंनापण घेऊन जाऊ.सकाळी नऊच्या सुमारास येतील असे दोन तांगे तुम्ही आजच सांगून ठेवा.आणि हो,सकाळी लवकर उठून बेकरीतून पावपण घेऊन या म्हणजे माईला एवढ्या सगळ्यांचा नास्ता करण्यात वेळ घालवायला नको.तांगा सांगायला जाशील तेव्हा बाबूला उद्या रात्रीच्या पुण्याच्या गाडीला आम्हाला सोडायलाही सांग."


"म्हणजे काय,तुम्ही लगेच जाणार?" यशा-मंदा-मुक्ताने चकित होऊन एकसाथ विचारलं,"काय करणार बाबा! पापी पेट का सवाल है.उद्या गेलो नाही तर मला नोकरीवरून काढून टाकतील.मग इथे तुमच्या गावात येऊन मला भिरभिरी बनवून विकावी लागतील."


मामांच्या ह्या बोलण्यावर सारेच हसू लागले.


अण्णांच्या बेकरीतून पाव आणणं हा यशा आणि त्याच्या दोन्ही बहिणींसाठी सटीसहामासी येणारा योग होता.घरचं धान्य होतं.गाईचं दूध-तूप होतं.त्यामुळे खाण्या-पिण्याची ददात नव्हती.पण रोख पैसा खर्च करून काही खायचं आणणं त्याकाळी परवडत नव्हतं आणि तशी पद्धतही नव्हती.बापूंच्या तुटपुंज्या पेन्शनमध्ये वरखर्च करताना महिन्याच्या शेवटी खर्चाची दोन्ही टोकं मिळवणं नेहमीच अडचणीचं असे.


माई त्यांना म्हणे,"सकाळी सकाळी हे बाहेरचे पाव आणून खाण्यापेक्षा मी तुम्हाला छानसे गरम गरम गाकर करून देते.दोन दोन हारोळ्या खाल्ल्या की,पोटातपण कसं दमदमीत असतं.नाही तर बाजरीची भाकरी आणि दूध आहेच."अण्णांच्या बेकरीतून उद्या पाव आणायचा हे आदल्या दिवशीच बापू मुलांना सांगत.मुलंही सकाळ कधी होते ह्याची वाट पाहत झोपत.झुंजूमुंजू झाल्यावर यशा आणि मंदा-मुक्ता पैकी जी कुणी जागी असेल ती थंडीचीच घरातून निघत.गल्लीतली कुत्री मागे लागत पण त्यांना दगड मारत,हाडहुड करत अण्णांच्या बेकरीपर्यंत पोहचत.बहुदा अजून अण्णांची बेकरी उघडलेली नसे.दुकानाबाहेरच्या थंडगार फरशीवर कोपऱ्यात ही भावंडं एकमेकांना चिकटून बसत.थंडीचा कडाका असला तरी दुकान उघडेस्तोवर तिथेच बसत. घरी जात नसत.न जाणो घरी जाऊन परत येऊ म्हटलं आणि बापूंनी बेत बदलला तर ! तर काय करायचं ?


बेकरीवाल्या अण्णांचं खरं नाव काय होतं कुणास ठाऊक. पण ते सगळ्यांना 'अण्णा' म्हणत म्हणून गावाने त्यांचंच नाव 'अण्णा' ठेवलं होतं.धुक्यात लांबून तपकिरी टोपी आणि पिवळसर कोट घातलेली आकृती दिसली की,मुलं खूश होत.यशाला पाहून अण्णा म्हणत, "यशाअण्णा,तुम्ही ताईसाहेबांना घेऊन थंडीचं असं बसलेलं पाहून माझ्या पोटात तुटत.आज सकाळी येणार हे कालच सांगितलं असतं तर लवकर आलो असतो. नाही तरी रात्रभर जागाच असतो."


मुलांना वाट बघायला लागली म्हणून अण्णा त्यांना पावांच्या बरोबर एकेक नानखटाईपण देत.अण्णांचं गावातल्या मुलांवर विशेष प्रेम होतं.बहुदा त्यांना स्वतःचं मूल नव्हतं.नानखटाई खात खात मुलं पाव घेऊन खुशीत घरी येत.यशा आणि मंदा घरी येईपर्यंत घरात उठाउठ झाली होती.मामा अंथरुणावर बसूनच माई-बापूंशी गप्पा मारत होते.माई-मामींच्या आंघोळी झाल्या होत्या.अजित-माधुरी आणि मोन्याने कालच त्यांच्या माईआत्याला बजावलं होतं की,'दामू दूध काढायला आला की,आम्हाला उठव,आम्हाला दूध काढताना पाहायचंय.'


त्याप्रमाणे ते तिघेही परसदारी गाईंचं दूध कसं काढतात त्याची गंमत बघायला गेले होते.माईंनी चहा ठेवला. मुक्ताने तिच्या वाटचा पाव घेऊन नेहमीप्रमाणे पावाची मधली बाजू कोरून पावाची चूल करायला घेतली.


साडेनवाच्या आधीच दोन्ही तांगे आले.आंघोळी, नास्ता आटोपून सगळे तयारच होते.माई,बापू,मामा,मामी एका तांग्यात आणि मुलं सगळी बाबूच्या तांग्यात बसली. घरातून निघाल्यापासून यशाची रनिंग कामेंट्री चालू होती.सुरुवातीलाच बालाजीचं देऊळ,सराफ कट्टा, काळ्या मारुतीचं मंदिर आणि बच्चू हलवायाचं मिठाईचं दुकान...सगळ्यांची माहिती सांगेस्तोवर गाव संपलं. गावाबाहेर आल्यावर यशाने त्यांना स्टेशनकडे जाणारा रस्ता दाखवला.


मुक्ता म्हणाली,"भावड्या आता शेटजीचा बाग मी दाखवणार हं!"


देवळातला पुजारी माईंना ओळखत होता.त्याने माईंना आणि शकुमामींना गाभाऱ्यात जाऊन देवीची ओटी भरू दिली.

नारायणमामांनी नारळ वाढवला.


माईंनी सांगितलं, "हे जागृत देवस्थान आहे.कुणाला काय मागायचं असेल तर ते जगदंबेकडे मागा!"


सगळी मुलं डोळे मिटून काहीतरी पुटपुटली.घरी येता येताच मुलं आणि मामा-मामी खरेदीसाठी बाहेर पडले. गाव पैठणीसाठी प्रसिद्ध असल्याने मामीसाठी पैठणी, महेशकडून पेढे आणि प्रकाश भत्तेवाल्याकडून भेळभत्ता अशी मोठी खरेदी झाली.मामांनी यशा आणि मंदा-मुक्तासाठीदेखील पेढे-भेळभत्ता घेतला होता.


दुपारी जेवणं झाली.थोड्यावेळ पाठीची कळ मोडून मामा-मामींनी सामानाचं पॅकिंग सुरू केलं.यशाला उगाचच फार उदास वाटू लागलं."नारायणा,येत जा रे मधूनमधून.अगदी दिवाळी ते दिवाळी नको करायला ! आणि येताना शकूला अन् मुलांनाही आणत जा.मुलं बघ कालपासून कशी खूश आहेत!"नोकरीच्या व्यापात असं जमणं फार सोपं नाही हे माहीत असूनही मामांनी बळेच होकार भरला. संध्याकाळचा चहा झाला.बाबूचा तांगा बाहेर येऊन उभा राहिला.बाबूने सामान समोर त्याच्या पायाजवळच्या जागेत आणि पायट्यावर व्यवस्थित बसवलं.


मामांची मुलं तर तांग्यात जाऊन बसलीसुद्धा.मामी आणि बापू बाहेर ओट्यावर उभे राहून गप्पा मारत होते. माई सुखरूप प्रवासासाठी देवाजवळ दिवा लावत असताना मामा देवघरात आले.माईना नमस्कार करून 'मुलांसाठी अन् अडल्या-पडल्याला राहू दे' म्हणत हजार रुपये माईंच्या हातात ठेवायला लागले तर माईंनी शॉक बसल्यासारखा हात मागे घेतला.


"नारायणा ! तू खूप मोठ्ठा झाला आहेस मलापण तुझा अभिमानच आहे. पण मला काही कमी नाही आणि काही प्रसंग पडलाच तर तुम्ही आहातच. एवढा डोंगराएवढा भाऊ परमेश्वराने दिला आहे.मला काय कमी आहे? आणि आज येताना तू मुलांसाठी खाऊ आणलेलाच आहेस."


मामांना मनोमन खात्री होती की,माई कधीही त्यांच्याकडे पैसे मागणार नाही. मामांचा गळा गहिवरून आला. "माई! तुला काय गं कमी पडणार ! देवाने सोन्यासारखी मुलं दिली आहेत. लहानपणी मोठी बहीण म्हणून आमच्यावर जसे संस्कार केलेस तसेच मुलांवर केलेस हे पाहून खूप बरं वाटलं. काल तुझ्या यशाला पुढच्या वेळी येताना टॉवेल,टूथपेस्ट आणू का म्हटलं तर ज्या तडफेने त्याने नकार दिला तेपण समोरच्याचं मन न दुखवता, तेव्हाच मनात विचार आला, ह्या घराचा भविष्यकाळ नक्कीच उज्ज्वल आहे. सध्या गरिबी आहे पण दारिद्र्य अजिबात नाही."


दोघा बहिणभावांच्या डोळ्यांतून अखंड गंगा-यमुना वाहायला लागल्या.बाहेरून बापूंनी दोनदा हाका मारल्या,"चला! गाडीची वेळ झालीय..."


तेव्हा कुठे दोघेही डोळे पुसत बाहेर आले.निरोपाचे शब्द उच्चारले गेले.तांगा निघाला.नजरेआड झाला.माई परत देवघरात येऊन देवासमोर बसल्या.मघाशी त्यांच्या डोळ्यांत अश्रू पाहून बापूही समजूतदारपणे ओट्यावरच थांबले होते.तिन्ही मुलं कशीनुशी झाली.देवघरात जाऊन माईंना बिलगून बसली.


"माई,तू का बरं रडत होतीस?" समजूतदार मंदाने विचारलं.

तिघांनाही जवळ ओढत माई म्हणाल्या, "आनंदाश्रू होते ते! मुलांचं कौतुक ऐकलं की,प्रत्येक आईचं असंच होतं."


यशाला माई काय बोलल्या त्याचा अर्थ कळला नाही पण त्यांचा उबदार स्पर्श त्याला खूप सुखद आणि भारी वाटला.


समाप्त…!!


२२/२/२६

नारायणमामा / Narayan Mama

दुपारची जेवणं आटोपली होती.माई अजूनही स्वैपाकघरातच आवरत होत्या.बापू एकटेच ओसरीवरच्या बैठकीत तक्क्याला टेकून बसले होते. माई बाहेर येण्याची थोड्या वेळ वाट पाहून त्यांनी पानाचं तबक जवळ ओढलं.त्यातली दोन पानं काढून नखाने ते त्यांच्या शिरा काढू लागले.पानं नखलून त्यांनी पानांना चुना लावला.काथ-सुपारी अडकित्त्याने बारीक कापून त्यांनी माईंचं अन् स्वतःचं पान बनवलं.तरी माईचं काम आटोपलं नव्हतं म्हणून बापूंनी हाक मारली,"काय देवा,अजून किती वेळ ? पान बनवून तयार ठेवलं आहे."


बापू चांगल्या मूडमध्ये असले की,माईंना 'सरकार' किंवा 'देवा'अशी हाक मारत.बापू बालगंधर्वांचे निस्सीम चाहते होते.नासिकला कंपनीचा मुक्काम होता.त्यावेळी बापूंची पोस्टिंग नासिकलाच होती.त्यांनी चक्क एक महिन्याची रजा टाकली होती.कंपनीच्या मुक्कामी ते नेहमी जात. रेव्हेन्यू ऑफिसमध्ये महत्त्वाच्या पदावर काम करत असल्याने त्यांना कंपनीत जायला मुक्तद्वार होतं.त्या महिन्यात झालेले सगळे खेळ त्यांनी पाहिले. बालगंधर्वांमुळेच 'देवा' हा शब्द त्यांच्या तोंडी रुजला असावा.बापूंची हाक ऐकून ओच्याला हात पुसत माई बाहेर आल्या.सतरंजीवर बसून त्यांनी बापूंनी तयार केलेलं पान घेतलं अन् म्हणाल्या,


"बाकीचं राहिलेलं आता चहाच्या वेळेला आवरीन. कारण मला माहीत आहे,जेवण झाल्या झाल्या तुम्हाला पान लागतं आणि मी आल्याशिवाय तुम्ही पान खाणार नाही!"


पान खाता खाता दोघांच्या गप्पा सुरू झाल्या."यशाचा 'पुला पुला'चा खेळ सुरू झालेला दिसतो.काही तरी नवीन नवीन खेळ शोधून काढतो.आज मंदाबरोबर मुक्तापण दिसती आहे पुलाच्या खेळात.'


माई कौतुकाने म्हणाल्या,"मंदी गरीब आहे.बिचारी मधली आहे.सगळ्यांशी चांगली,यशा म्हणेल ती पूर्वदिशा करते.

त्यामुळे तिचं यशाशी चांगलं जमतं.मुक्ती म्हणजे धाकटी आणि छाकटी आहे.लवंगी मिरचीच जणू.ती काही यशाची दादागिरी ऐकून घेत नाही आणि मग यशा तिला वाळीत टाकल्यासारखं करतो.तिच्याशी बोलत नाही,तिला खेळायला घेत नाही,तिच्यासमोर मंदाचे जास्त लाड करतो.पण हीदेखील कट्टर.तीपण जमवून घेत नाही.पण आज तिघंही पुलाचा खेळ खेळताहेत.तात्पुरती भांडणं असतात,झालं.

पाण्यात काठी मारून त्याचे दोन भाग होत नाहीत.तसंच आहे हे. गुणी आहेत माझी तिन्ही मुलं.कधी हट्ट नाही की त्रास देणंही नाही! वयाच्या मानाने त्यांना परिस्थितीची जाणीव खूप आहे.गरिबांची मुलं गुणी असणं हेच त्यांचं धन."


ते दोघे बोलत असतानाच विनायक पोस्टमन वाड्याच्या दरवाजातून चौकापर्यंत आला होता."बापू इनलैंड लेटर आलंय,

पुण्याचंच आहे,माईंच्या माहेरचं दिसतंय..." असं म्हणत त्यांनी पत्र बापूंच्या हाती दिलं.छोट्या गावात सगळेच सगळ्यांना ओळखत.

एवढंच काय,कुटुंबाच्या नातेवाईकांचीदेखील माहिती इतरांना असे.


बापूंना पत्र देऊन विनायक पोस्टमन निघून गेला.बापूंनी सावकाश पत्र उघडलं वाचून झाल्यावर माईंकडे बघत ते म्हणाले,


"देवा,तुमचा लाडका भाऊ येतोय परवा बायकोबरोबर. मुलंपण येताहेत."


माईंच्या चेहऱ्यावर आनंद पसरला.नारायण त्यांचा सगळ्यात धाकटा भाऊ.पुण्यात खूप मोठ्या पदावर नोकरी करणाऱ्या नारायणला माईंची फार ओढ होती. दरवर्षी भाऊबीजेला तो न चुकता येत असे.यंदा मात्र महत्त्वाचं काम निघाल्याने नारायणची भाऊबीजेची खेप चुकली होती.म्हणून मुलांना नाताळाची सुट्टी लागताच बायकोमुलांसह तो येणार होता.उद्याचाच दिवस मध्ये आहे.काय तयारी करायची,घरात काय हवं-नको ते बघायचं,ह्याची माई-बापूंची चचर्चा सुरू झाली.


ओसरीला लागून असलेल्या खोलीत यशा आणि मंदा-मुक्ताचा खेळ रंगात आला होता.यशा गोधडी पांघरून आडवा पडला होता.तो झाला होता पूल.मंदा आणि मुक्ता पुलाला काही तरी प्रश्न विचारायच्या आणि यशा पांघरुणाखालून अशी काही तरी वात्रटासारखं उत्तरं द्यायचा की,त्या दोघी खुदुखुदु हसायच्या.प्रश्न जितके असंबद्ध तितकीच पुलाची उत्तरं विचित्र आणि असंबद्ध.

त्यामुळे त्या दोघींचं हसू थांबतच नसे.उत्तरं देणारा पूल मात्र कधीच हसत नसे.मंदा नाही पण मुक्ता अधूनमधून पूल होण्याचा हट्ट करायची पण यशा त्या गोष्टीला ठाम नकार देत असे.तो म्हणे, "तर मग खेळा तुम्ही दोघीच!" त्याने असं म्हटल्यावर मंदा म्हणायची, "भावड्या नसेल तर खेळात काय मज्जा ! मग मीपण नाही खेळणार."


मुक्ता हिरमुसली होऊन थोडा वेळ प्रश्न न विचारता तशीच बसून राही.पण थोड्या वेळाने नकळत पुन्हा प्रश्न विचारायला सुरुवात करायची.पूलपण तिच्या प्रश्नांना जास्त खेळकरपणे उत्तरं देऊन तिला खूश करी. तासन्तास रंगात आलेला हा खेळ माई आल्यावर थांबला.पुलानेपण अंगावरची गोधडी बाजूला केली. माईंनी मुलांना बातमी सांगितली -


"यशा, मंदा, मुक्ता... अरे,परवा सकाळच्या गाडीने पुण्याहून तुमचा नारायणमामा,शकुंतला मामी अन् त्यांची मुलंपण येणार आहेत.

आत्ताच नारायणाचं पत्र आलंय.अचानक समजल्याने आपली थोडी धावपळ होणार आहे.तुम्हालापण आता खूप कामं आहेत.

खरं तर,नारायणाने पंधरा दिवसांपूर्वीच पत्र टाकलं होतं.पण म्हणतात ना,पोष्टाचं काम अन् महिनाभर थांब, तशातली गत झाली ! यशा,तू बाबूला परवाची तांग्याची वर्दी देऊन ये.न विसरता जा म्हणावं आणि त्यानंतर आप्पांच्या घरी जाऊन त्यांना परवापासून 'सकाळ' अन् एक इंग्रजी पेपर टाकायला सांग."


"आप्पा म्हणजे नरकेसरी ना?" यशाने खट्याळपणे विचारलं.


अर्ध्या बाह्यांचा शर्ट अन् हाफ पँट घातलेले आप्पा पेपर विकताना गल्लीत शिरले की,'केसरी ऽऽऽ' अशी आरोळी मारत.पन्नाशीतल्या आप्पांचा एक डोळा अनियंत्रितरीत्या फिरत राह्यचाआप्पांच्या 'केसरी ऽऽऽ' ह्या आरोळीमुळे सगळं गाव त्यांना त्यांच्या परोक्ष 'नरकेसरी' म्हणायचं.


माई कृतककोपाने म्हणाल्या,"यशा,चावटपणा करू नकोस.आप्पा म्हटल्यावर कोण ते तुला बरोबर समजल होतं.आणि हो,इंग्रजी पेपराचं विसरू नकोस सांगायला. नारायणाला त्याशिवाय चहा गाड लागत नाही.मोठा साहेब आहे ना तो !"


नारायणमामा मोठे साहेब आहेत हे मुलांना पक्कं माहीत होतं.

त्यांच्या घरीच काय,पण अख्ख्या गावात सूटबूट घालून येणारे ते एकमेव पाव्हणे होते.


"मंदे,तू शेजारी वत्सलाबाई आहेत का,बघ.अन् त्यांना म्हणावं,

माईंनी घर सारवायला बोलावलंय.चारपाच चादरी अन् गोधड्याही भिजवून ठेवल्यात,त्या धुवायच्यात म्हणावं !"


एकंदरीत माईंची भाऊ-वहिनी येणार म्हटल्यावर चांगलीच धावपळ सुरू झाली होती."तरी बरं, नारायणाचे खायचे चोचले नाहीत.लहानपणापासून पोळी कुस्करून त्यावर वरण घालून दिलं की,स्वारी खुश.त्यातल्या त्यात डाळ-मेथ्यांचं वरण मिळालं की काय ब्रह्मानंदच! शकू मागे एकदा भेटली तेव्हा सांगत होती, 'कुठे लग्नात जेवायला जायला असलं तरी हा आपला वरण-पोळीचा डबा घेऊन जातो.' मोठ्या लोकांचं सारंच वेगळं!" माईंच्या स्वरात कौतुक ओथंबत होतं.


माई नारायणमामा कुटुंबासह येणार हे सांगून गेल्या आणि बच्चे कंपनीच्या गप्पांना एक वेगळाच उत्साह आला. पुलाचा खेळ केव्हाच गुंडाळून ठेवला गेला होता. मुक्ता म्हणाली, "भावड्या, मंदा,आपण आता 'मनोराज्यम्' करू!" ते तिघेजण मामा आल्यावर काय काय करायचं,ह्याचं मनोराज्यम् करू लागले.मामांच्या अजित,माधुरी आणि मोन्याला ते खूप वर्षांनी भेटणार होते. यशा म्हणाला,


"मी अजित आणि मोन्याला माझ्या साठवलेल्या गोट्यांचा डबा दाखवीन.अन् माझा टम्मण जर त्यांनी मागितला तर तोही देऊन टाकीन.अजित एकदम भारी क्रिकेट खेळतो.मी त्याला शाळेच्या ग्राऊंडवर सगळे क्रिकेट खेळतात,तिथे घेऊन जाईन खेळायला.

नेहमी जोरात बॉल टाकून तो नवीन मला घाबरवतो अन् पहिल्याच ओव्हरमध्ये आऊट करतो ना! आता आला आहे पुण्याहून आमचा पठ्ठ्या ! त्याला टाका कितीही फास्ट बोलिंग.मारेल बघ तुला सणासण सिक्सर अन् बाऊंड्र्या!"


यशाचं मनोराज्य तर सुरू झालंदेखील.मंदा आणि मुक्ता त्यांना गॅदरिंगच्या वेळेला केलेले डान्स करून दाखवण्याचं ठरवू लागल्या.घरी कुणी पाव्हणे आले की, यशा प्रतिष्ठितासारखा त्यांच्या गप्पा ऐकत एका कोपऱ्यात बसायचा आणि मध्ये मध्ये काही न बोलता माईंच्या भाषेत सांगायचं तर 'श्रवणभक्ती करायचा'. अशा वेळी तो नजरेनेच मंदा-मुक्ताला तिथे न थांबता बाहेर जाण्याचे इशारे करायचा.यशाच्या नजरेकडे लक्ष ठेवून असलेली मंदा मुकाट्याने बाहेर निघून जायची पण डांबरट मुक्ता यशाकडे जाणीवपूर्वक बघायचीच नाही.तिथेच चिकटून राह्यची.

यशाचा जळफळाट व्हायचा.पण पाव्हण्यांसमोर त्याला काही बोलता यायचं नाही.मग पुढचे दोन दिवस यशाची अन् मुक्ताची कट्टी असायची.अशावेळी मुक्तासमोर मंदाला तो हळू आवाजात काही तरी गमती सांगायचा.खरं तर,मंदाचा मुक्कामासाठी जीव तुटायचा पण यशासमोर काही बोलण्याची तिची हिंमतही नसायची.आता मात्र मनोराज्यम् करताना मंदाने मुद्दाम हा विषय काढला. कारण नारायणमामाचा गप्पिष्ट स्वभाव अन् मैफल रंगवण्याची हातोटी सगळ्यांनाच ठाऊक होती.


गावगोत,माधव सावरगांकर,अष्टगंध प्रकाशन


"भावड्या,ह्या वेळेला आम्हाला पण मोठ्या लोकांच्या गप्पा चालतात तिथे बसू देशील ना ?"


यशाने मंदाच्या ह्या विनवणीला मोठ्या मनाने मान्यता दिली आणि पुढच्या गप्पा मग मंदा-मुक्ताकडून आणखी उत्साहाने चालू राहिल्या.थोड्या वेळाने माईंनी परत आठवण करून दिल्यावर यशा त्याची लोखंडी चकारी घेऊन रस्त्यात खेळत खेळतच पहिल्यांदा बाबू टांगेवाल्याकडे वर्दी द्यायला गेला,


"बापूंनी सांगितलंय,'महाराष्ट्र एक्सप्रेसने पुण्याहून आमचे मामा, मामी आणि मुलं येणार आहेत. दुसरी सवारी घेऊ नका.' बाबूकाका,ओळखता ना तुम्ही मामांना ? दरवर्षी येतात बघा दिवाळीला."


यशाच्या बोलण्यावर बाबू हसून उत्तरला, "यशवंता, मामासाहेबांना मी कसा विसरेन ? सूटबूट घालून माझ्या तांग्यात बसणारी ती एकच तर सवारी आहे.स्वभावपण अगदी माईसारखाच आहे.गरीब असो,श्रीमंत असो, अगदी मोकळेपणाने गप्पा मारतात.एवढे मोठे साहेब आहेत पण अजिबात गर्व नाही.माईंना सांग,काही काळजी करू नका.टायमात जाईन अन् बैजवार घरी आणून सोडीन त्यांना."


यशाची चकारी खडखड आवाज करत आप्पांच्या घराकडे झिंगाट निघाली.


आप्पा लांब तीन देवळांच्याही पुढे मोमीन गल्लीत राहत. 'सकाळ' आणि इंग्रजी वर्तमानपत्रांचा निरोप दिल्याबरोबर आपल्या न फिरणाऱ्या उजव्या डोळ्याने यशाकडे रोखून बघत आप्पा म्हणाले, "पुण्याचे पाव्हणे येणार असं दिसतंय. माईसाहेबांच्या माहेरचे का ?"


आप्पांच्या चुणचुणीत तर्काचं यशाला खूपच आश्चर्य वाटलं. "तुम्ही कसं ओळखलंत?" यशाने न राहवून विचारलं, "अहो यशवंतराव, 'सकाळ' वाचणारा माणूस म्हणजे पुण्याचाच असणार आणि माईंचं माहेर पुण्याचं आहे, हे काय आम्हाला माहीत नाही होय ?"


आप्पांच्या उत्तराने यशाला त्यांच्या हुशारीचं कौतुकच वाटलं. चकारी चालवत घरी येताना यशा आप्पांच्या हुशारीचा विचार करत होता. उगाच नाही सगळं गाव आप्पांना 'नरकेसरी' म्हणत.


'हुशारी सिंहासारखी आहे खरी. डोळा सारखा फिरत असतो पण बुद्धी मात्र स्थिर असते,'


कधी तरी मोठ्यांच्या गप्पांत बाजूला बसून ऐकलेलं हे वाक्य यशाला आठवलं.नकळत त्याने मान हलवून त्या वाक्याला मान्यता दिली.तो स्वतःशीच हसला.


ठरल्याप्रमाणे बाबूचा तांगा पाव्हण्यांना घेऊन घरी आला आणि घराचं वातावरण एकदम बदलून गेलं. नारायणमामा म्हणजे उत्साहाचा धबधबाच. बहुश्रुतपणाला विनोदाची फोडणी.आणि कुठल्याही वयाच्या श्रोत्यांशी मैफल रंगवून टाकण्याची हातोटी.स्वैपाकघरात गप्पांचा अड्डा जमला.।

अपर्ण शिल्लक भाग पुढील लेखामध्ये…



२०/२/२६

इन्द्राची नीतिमूल्ये / Indra's ethical values

जशी एका समाजांतर्गत एकतर्फी देवाण-घेवाण पोसली गेली,तशीच वेगवेगळ्या समाजांतील व्यक्तींकडून दुसऱ्या समाजाचे शोषणही पोसले गेले.इजिप्तच्या नाईल नदीप्रमाणेच भारतात सिंधू नदीच्या खोऱ्यात हडाप्पा,मोहेंजोदाडो,लोथाल ह्या नगरांच्या आसपास अशाच सुपीक शेतीच्या अतिरिक्त उत्पादनाच्या आधारे मोठ्या प्रमाणावर श्रमविभागणी झालेली समाजव्यवस्था अस्तित्वात आली. 


ह्या संस्कृतीचा व्यापार अरबस्थानापर्यंत पसरला होता. ह्या व्यापाऱ्यांचा जमाखर्च नोंदवण्यासाठी एक लिपी पण वापरात आली,पण आजतागायत तिचा अर्थ लावता आलेला नाही,त्यामुळे ह्या संस्कृतीबद्दल आपली माहिती फार तुटपुंजी आहे.इजिप्तमध्ये पिरामिड बांधत होते त्या काळात,चार पाच हजार वर्षांपूर्वी ही संस्कृती भरभराटीला आली होती.सुमारे दीड हजार वर्षांपूर्वी ती खालावत खालावत लयाला गेली.ऱ्हासाला पर्जन्यमानात झालेली घट व त्यामुळे घटलेले अतिरिक्त कृषि उत्पादन जबाबदार होते असा एक अंदाज आहे. पण आणखी एक सुचवले गेले आहे की,मध्य आशियातून आलेल्या वैदिक संस्कृतीच्या लोकांच्या आक्रमणाने मोहेंजोदाडो संस्कृती उद्ध्वस्त झाली. 

'वारुळ पुराण',माधव गाडगीळ',ई.ओ.विल्सन,अनुवाद - नंदा खरे,मनोविकास प्रकाशन ) हे समाज प्रामुख्याने पशुपालक समाज होते. त्यांच्यापाशी घोडे होते,लोखंडी हत्यारे होती.त्यांच्या बळावर त्यांनी शेतीप्रधान,स्थिर समाजांवर कुरघोडी केली.अशा युद्धांत दया-माया न बाळगणारे यशस्वी होतात.वैदिक समाजाचा एक नेता होता,इन्द्र.तो असाच निर्दय होता असे दाखवले गेले आहे.इन्द्राचे दुसरे नाव आहे पुरंदर,अथवा शहरे उद्ध्वस्त करणारा.त्याने मोहेंजोदाडो संस्कृती पुरी नष्ट केली अशीही एक शक्यता वर्तवली जाते.


प्रत्येक माणसाच्या अंतर्मनात काही प्रमाणात तरी स्वार्थ आणि परोपकार,हिंसा आणि करुणा,क्रौर्य आणि दया-क्षमा-शांती,

खोटेपणा आणि सच्चेपणा ह्यांच्यात रस्सीखेच,कुतरओढ चालू असते.समाजातही ह्या परस्परविरोधी प्रवृत्तींची स्पर्धा,ह्यांचे द्वंद्व पाहायला मिळते.इन्द्र आणि प्रतर्दनाचा एक संवाद ह्या द्वंद्वाचे चित्रण करतो.दिवोदासाचा पुत्र प्रतर्दन युद्ध करून आणि पराक्रम दाखवून इन्द्राच्या आवडत्या वाड्यांत गेला.त्याला इन्द्र म्हणाला,"हे प्रतर्दना,तुला मी वर देतो." प्रतर्दन म्हणाला, "जो मनुष्याला कल्याणकारक होईल असा वर दे." इन्द्र उत्तरला,"वर दुसऱ्याकरतां घेत नसतात.स्वतःसाठी वर मागून घे." प्रतर्दन "माझ्यासाठी मला वर नको." तेव्हा इन्द्राने सत्य गोष्ट सांगितली. कारण इन्द्र सत्य आहे.तो म्हणाला, "मला जाण.तेच मनुष्याला हितकारक आहे की जेणेकरून मला तो जाणेल.त्वष्ट्याच्या मुलाला त्रिशीर्षाला मी ठार मारले. अरुर्भग नावाच्या यतींना कुत्र्यांकडून खाववले. पुष्कळ तहांचे अतिक्रमण करून दिव्यलोकी प्रल्हादाच्या अनुयायांना,अंतरिक्षांत पौलोमांना आणि पृथ्वीवर कालकाश्यांना मी ठार मारले.त्या प्रसंगी माझा एक लोम देखील वाकला नाही.अशा प्रकारे जो मला ओळखील,त्याने मातृवध,पितृवध,चौर्य,भ्रूणहत्या इत्यादी पापे केली असता किंवा तो करीत असता त्याला भीती वाटणार नाही,किंवा त्याच्या तोंडाचा नूर पालटणार नाही."


खांडववन दहन


इन्द्रकाली,सुमारे तीन हजार पाचशे वर्षांपूर्वी वैदिक संस्कृतीतले समाज सिंधू नदीच्या खोऱ्यात पोचले असावे.हळूहळू पसरत जाऊन महाभारत काली,सुमारे तीन हजार वर्षांपूर्वी ते यमुनातीरी पोचले.गुरे-ढोरे बाळगणाऱ्या,नांगराने शेती करणाऱ्या तथाकथित आर्य जमातींच्या इतिहासात वने जाळण्याच्या कापण्याच्या अनेक घटना आढळतात.महाभारतातील राज्ये लहान होती.एक राजधानी,सभोवती शेती असलेली खेडी व त्याभोवती अरण्य असे राज्यांचे स्वरूप होते.पण ही अरण्ये म्हणजे कोणाचीच मालकी नाही अशी भूमी नव्हती.मोहासारख्या वनोपजावर,

शिकारीवर,कुदळीने खणून फिरती शेती करण्यावर जगणारे तिथल्या रहिवासी नागांचे परिवार अशी वने जाळण्याला विरोध करत होते.रान जाळणे व शेतकऱ्यांना ते वसाहतीला देणे हे राजाच्या कर्तव्यांपैकी एक होते.तेच कृष्णा -अर्जुनांनी केले.असे रान जाळून वसाहतीला द्यायचे असेल तर त्या जमिनीला कोणी मालक असता कामा नये,म्हणून त्या भूमीत वंशपरंपरा राहणाऱ्या सर्वांचा संहार केला.


कृष्ण व अर्जुन यमुनेकाठी मजेत वनविहार करावयाला गेले असताना अरण्य जाळण्याची कल्पना निघालीच का? महाभारत सांगते की अग्नी ब्राह्मणाचे रूप घेऊन आला आणि त्याने खाद्य मागितले.ब्राह्मणाला नाही कसे म्हणणार म्हणून खांडव जाळले.

जाळले ते कसे? तर दोघांनी दोन बाजूने रथ व धनुष्यबाण असे चालवले की, एकाही प्राण्याला बाहेर निघता येऊ नये,


नागराज तक्षक कुरुक्षेत्राला गेला होता म्हणून वाचला.त्याचा मुलगा मोठ्या युक्तीने स्वत:चा प्राण देऊन आईने वाचवला.

तक्षकाच्या घराण्यातील इतर सर्व मारले गेले.खांडव वन दहनात कुठल्याच तऱ्हेचे विधिनियम दिसत नाहीत.नागांचा संहार हेच एक उद्दिष्ट दिसते.अर्जुन क्षत्रिय होता.क्षत्रियाचे ब्रीद बरोबरीच्यांशी युद्ध,क्षत्रियाचे ब्रीद शरणागताचे रक्षण,क्षत्रियाचे ब्रीद कोणाचा तळतळाट न घेणे.

अर्जुन विराटपर्वात सांगतो : मी लढत असताना कधीही बीभत्स कृत्य करत नाही. मग त्याने खांडव वन का जाळले? आतील सर्व प्राणी, पक्षी,एवढेच नाही तर स्त्रिया मुलांसकट नागपरिवार निःशेष का मारले?असे दिसते की शरणागताचे रक्षण, बरोबरीच्याशी युद्ध करणे हे क्षत्रियांचे नियम स्वतःच्या समाजापुरते होते.ते परकीयांना लागू पडत नव्हते.

एकोणिसाव्या शतकात गोऱ्या लोकांनी दक्षिण अमेरिकेतील अर्जेन्टीनातील,ऑस्ट्रेलियन खंडाच्या टास्मानिया बेटावरील आदिवासींची जनावरांची करावी तशी शिकार केली,असा अगदी ताजा इतिहास आहे.त्याच शतकात त्याच गोऱ्या लोकांनी भारत पादाक्रांत केल्यावर कायद्यांच्या आधारे अरण्यभूमीत वंशपरंपरा राहणाऱ्या अनेक आदिवासीयांचे सर्व हक्क हिरावून घेतले.एका दिवसात त्यांचे पिढ्यान् पिढ्यांचे उपजीविकेचे मार्ग हे अपराध ठरवले.मग त्यांना वेठबिगारीला लावले.दूरदूरच्या चहाच्या मळ्यांत जायला लावून तेथे गुलामांसारखे वागवले.


रेमंड डास्मान या परिसरशास्त्रज्ञाने प्राधान्याने स्वतःच्या पंचक्रोशीतील निसर्गसंपत्तीवर गुजराण करणाऱ्या मानव समाजांना परिजन अथवा ecosystem people, केवळ वस्तीच्या आसमंतातील संसाधनेच उपलब्ध न राहता दूर दुरून आणलेली संसाधने वापरणाऱ्या मानव समाजांना ऊर्वीजन अथवा biosphere people असे नामाभिधान सुचवले आहे.रामचंद्र गुहा आणि मी सुचवतो की मानव - निसर्ग ह्यांच्या परस्परसंबंधांचा विचार करता एक तिसरा वर्ग संभावतो;तो म्हणजे आसमंतातील संसाधनांपासून ज्यांची जबरदस्तीने, बळजबरीने फारकत झालेली आहे असे लोक- परिविस्थापित अथवा eco logical refugees. खांडव वन जाळले तेव्हा असा परिविस्थापित झालेला 


नाग त्या वेळी तक्षकाच्या घरी पाहुणा म्हणून आलेला. एक असुर,मयासुर,कृष्ण ह्यालाही मारू इच्छित होता,पण अर्जुनाने त्याला अभयदान दिले.मय हा उत्तम शिल्पशास्त्री होता.जीवदानासाठी कृतज्ञता व्यक्त करत त्याने युधिष्ठिराला मयसभा बांधून दिली. अशा वास्तूंचे मुख्य उद्दिष्ट असते आपला दिमाख मिरवणे.एका दृष्टीने हे पूर्णपणे सफल झाले,आणि मयसभेचा भपका बघून कौरवांच्या मनात जो मत्सर निर्माण झाला,त्यातून महाभारताचे युद्ध घडून आले.


जगात सर्वत्रच फैलावत असलेल्या बलिष्ठ समाजांनी ते जिथे पसरत होते,त्या मुलखात आधी राहणाऱ्या समाजांना एक तर नष्ट केले,वेगळे ठेवत अंकित केले, किंवा सामावून घेतले. कृष्ण-अर्जुनांनी नागांना समूळ नष्ट करण्याचा प्रयत्न केला.पण ह्या जोडीलाच वेगवेगळे समाज एकत्र येऊन त्यांचे मिश्रणही होऊ लागले. अर्जुनानेच नागकन्या उलूपीशी विवाह केला.भीमाने असुरांच्यातल्या हिडिंबेशी.परंतु पूर्ण वंशच्छेद अथवा सामावून जाणे ह्याहूनही जास्त प्रमाणात भारतीय समाजात ज्यांच्यावर वर्चस्व प्रस्थापित केले अशा समाजांना वेगळे ठेवून,त्यांच्याशी रक्तसंबंध टाळून खालच्या पातळीवरच्या जाती - पोटजाती घडवण्यात आल्या असे दिसते.अशा जाती-जातींत संकर होणे अनिष्ट अशी विचारधारा उद्भवली.महाभारत युद्धाच्या आरंभी अर्जुन कृष्णाला स्पष्टच म्हणतो,वर्णसंकरातून अनर्थ उद्भवतो : तैसा कुळी क्षयो होये। तेव्हळि आदि धर्म जाए। मग आन काही आहे। पापावांचौनि।। जै यमनियम ठाकवि। तें इंद्रियें सैरा विचरति। म्हणौनि व्यभिचार घडती। कुळचियं ।। उत्तम अघमी संचरति। वर्णावर्ण मिसळति। तेथ समूळ उपडति। जातिधर्म।। जैसें चौदष्टांचेया बळी। पावति मेरा काढली। महापापे कुव्छि। प्रविशति ।।


भारताबाहेरील समाजात मात्र अमे वर्णसंकट, जातिसंकट टाळले पाहिजेत अशी रचना रुजली नाही. चीनमध्ये राज्यातले प्रशासक मॅन्डारिन हा प्रतिष्ठितांचा कंपू समाजाच्या सर्व थरातून स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून निवडला जाई.मध्ययुगीन युरोपात विद्यापीठांच्या माध्यमांतून समाजाच्या वेगवेगळ्या थरांतून लोक विद्वत्तेच्या बळावर एकत्र येऊ लागले. आधुनिक गणितीय तर्कशास्त्राचा जनक समजला जाणारा जॉर्ज बूल केम्ब्रिजला गणिताचा प्राध्यापक होता. पण त्याचा बाप चांभार होता आणि आई घरगुती मोलकरीण.युरोपीय समाजात जातिव्यवस्था नाही,तर समान आर्थिक हितसंबंध जपणाऱ्या "व्यापाऱ्यांचे गिल्ड" अतिशय प्रभावी बनले.


बुद्ध


महाभारतातली यमुनाकाठच्या खांडववन दहनाची घटना बहुधा तीन हजार वर्षांपूर्वी घडली.वनाच्छादित भारतात पशुपालक आर्यांचा विस्तार होत असताना यज्ञसंस्कृतीला मोठे महत्त्व प्राप्त झाले.नव्या मुलखात वस्ती करताना वनप्रदेशात आश्रम स्थापन करून मोठ्या प्रमाणात लाकूड जाळत तिथे गुरांना अनुकूल अशी माळराने निर्माण करायची.ह्याला विरोध करणाऱ्यांना राक्षस-असुर अशा संज्ञा देऊन त्यांच्यावर पशुपालकांतील योद्ध्या क्षत्रियांनी आक्रमण करून हटवायचे अशी प्रणाली प्रस्थापित झाली.गंगेच्या खोऱ्यात जसजसे मूळचे सालाचे अरण्य तोडले गेले आणि रानात शिकार कंदमुळे आणि फिरती शेती करणाऱ्या नाग असुरांसारख्या समाजाच्या जागी स्थायी शेती व जोडीला पशुपालन करणाऱ्यात समाजाची वसाहत वाढत गेली,तसतसे यज्ञाचे जे मूळचे जंगल नष्ट करत जमीन स्थिर शेती-पशुपालनाखाली आणण्याचे कार्य होते ते संपुष्टात आले.तदनंतरच्या पाच शतकात बहुधा संपूर्ण गंगा खोऱ्यात जिथे सहज शक्य होते,तिथे कृषि पशुपालन संस्कृतीचा विस्तार पुरा झाला.या कारणे बुद्धाच्या काळात,दोन हजार पाचशे वर्षांपूर्वी, यज्ञाचे मूळ समर्थन गैरलागू झाले.


ह्या सर्व काळात,नव-नवा प्रदेश पादाक्रान्त करणारी आक्रमक संस्कृती वरचढ होती.एक वर्णव्यवस्था रूढ होत गेली.

ब्राह्मणांची,क्षत्रियांची,वैश्यांची,शूद्रांची कर्तव्ये त्यांनी परंपरेप्रमाणे बजावणे हेच सर्वश्रेष्ठ मूल्य;दुसरी काहीही मूल्ये मानू नयेत,असे प्रतिपादन केले गेले.ह्या व्यवस्थेत खालच्या आणि वरच्या वर्णाच्या लोकांच्यातील देवाण-घेवाण ही उघडपणे खालच्या वर्गांच्या दृष्टीने अन्याय्य होती. 


ज्ञानेश्वरीतल्या अठराव्या अध्यायात म्हटलेच आहे ना :


तेचि चारी वर्ण । पुससी जरी कोण कोण । 

तरी जयां मुख्य ब्राह्मण । धुरेचे कां ।। ८१८ ।। 

येर क्षत्रिय वैश्य दोन्ही । तेही ब्राह्मणाच्याचि मानिजे मानी । जे ते वैदिकविधानीं । योग्य म्हणौनि ।। ८१९ ।। चौथा शूद्रु जो धनंजया । वेदीं लागु नाहीं तया । तह वृत्ति वर्णत्रया । आधीन तयाची ।। ८२० ।। तिये वृत्तिचिया जवळिका । वर्णा ब्राह्मणादिकां । शूद्रही कीं देखा। चौथा जाला ।।


साहजिकच यज्ञसंस्कृतीबाबत असंतोष व विरोध पसरत होता.यज्ञात मोठ्या प्रमाणात पशू - शेतकऱ्यांची गोसंपदाही बळी दिली जायची.त्याबाबत शेती-पशुपालन करणाऱ्यांवर जो बोजा पडत होता त्याबद्दल चीड उत्पन्न होत होती.क्षत्रियांनी सतत कर्तव्य म्हणून लढलेच पाहिजे,हिंसा केलीच पाहिजे,हे नाकारण्याचा विचार निर्माण होऊ लागला होता. करुणा,मैत्री अशीही मूल्ये महत्त्वाची असू शकतील असे मनात येऊ लागले होते.अशा काळात शाक्य गौतमाचा जन्म झाला.नदीच्या पाण्यावरून शाक्यांचा शेजारच्या टोळीशी सतत संघर्ष चालू होता.अशा संघर्षात लढणे, हिंसा करणे हे गृहस्थाश्रमी गौतमाचे कर्तव्य होते.पण ही समाजरचना बदलली पाहिजे,वेगळ्या मूल्यांचा विचार केला पाहिजे,असे मनात आणून त्याने गृहस्थाश्रमाचा त्याग केला.देहदंड करणारे तप केल्यावर ह्यातून काही चांगले निष्यत्र होत नाही,असे त्याच्या मनात आले आणि मग त्याला चार आर्यसत्ये समजली.अशी अगदी वेगळी मुल्ये,मग तो प्रतिपादन करत राहिला.समाजशील मानवाच्या मनात जी स्वार्थपरायणता आणि समूहासाठी काहीतरी त्याग करतही वेगळे करायला पाहिजे अशी जी भावना असते,त्या प्रवृत्तीचे समर्थन करत त्याने धर्मरचना केली.


बुद्ध सांगतो की जगात दुःख आहे हे कोणालाही नाकबूल करता येत नाही.परंतु जो तो आपले दुःख कसे नष्ट होईल याच विचारात असतो.त्याचा परिणाम असा होतो की,दुसऱ्याचा घातपात करून देखील प्रत्येक जण आपण सुखी होऊ इच्छितो.त्यांत जे हिंसक असून बुद्धिमान असतात,ते पुढारी बनतात,व इतरांना त्यांचे ताबेदार व्हावे लागते.हिंसक बुद्धीमुळे या पुढाऱ्यात देखील एकोपा राहत नाही आणि त्यांना सगळ्यांत जास्त हिंसक आणि बुद्धिमान पुढाऱ्याला आपला राजा करून त्याच्या तंत्राने वागणे भाग पडते.राजाला आपले राज्य दुसरा राजा घेईल असे भय वाटते,

आणि त्याच्या सुरक्षितपणासाठी तो यज्ञयाग करून अनेक प्राण्यांचे बळी देतो.अशा प्रकारची मनुष्यांना आणि इतर प्राण्यांना उपद्रवकारक समाजरचना नष्ट करून तिच्या जागी दुसरी हितसुखकर संघटना उभारावयाची असेल, तर प्रत्येकाला आपले आणि इतरांचे दुःख एक आहे अशी जाणीव झाली पाहिजे;आणि म्हणूनच बुद्ध भगवंताने पहिल्या आर्यसत्यांत सर्वसाधारण दुःखाचा समावेश केला.सामाजिक पशुंच्यात इतरांवर कुरघोडी करण्यासाठी सतत चढाओढ चालते.ह्या चढाओढीत सरशी होण्यासाठी प्राणी दिमाख दाखवण्याच्या मागे लागतात,व असा तोरा मिरवण्यासाठी उधळपट्टी करत राहतात.ही उधळपट्टी करण्याची ओढ,म्हणजेच मानवाची अनेक तऱ्हेची हाव अथवा तृष्णा. मनुष्याची तृष्णा हेच दुःखाचे खरे कारण आहे,हे बुद्ध भगवन्ताचे महत्त्वाचे प्रतिपादन होते.हे होते पहिले आर्यसत्य.ही तृष्णा जोपर्यंत असेल तोपर्यंत दुःख उत्पन्न होणारच,हे दुसरे आर्यसत्य.तृष्णेचा नाश करण्यानेच मनुष्य दुःखांतून मुक्त होतो,हे तिसरे आर्यसत्य. तृष्णानाशाचा उपाय म्हटला म्हणजे दोन अंतांच्या, देहदंड व भोगवाद ह्यांच्यामधून जाणारा आर्य अष्टांगिक मध्यम मार्ग,हे चौथे आर्यसत्य.


पण बुद्धाने स्पष्ट केले की तो जे काय सांगतो ती अधिकारवाणी मानू नये.ते विचारान्ती तुम्हाला पटले तरच मान्य करा.वास्तव नीट जाणायचे असेल तर कोणतीही अधिकारवाणी न मानता सर्व विधाने वास्तवाच्या निकषावर पडताळून पाहणे हा एकच परिणामकारक मार्ग उपलब्ध आहे.