विजय मयान विचार
संपादकीय जाहीरनामा
आमचा उद्देश व्यक्तींची प्रतिमा निर्माण करणे नाही; सत्यापित विचार लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे.
प्रत्येक विचार प्रकाशित करण्यापूर्वी आम्ही उपलब्ध प्राथमिक स्रोत, संदर्भ आणि ऐतिहासिक सत्यतेची शक्य तितकी पडताळणी करण्याचा प्रयत्न करू.
जर एखादा विचार शब्दशः सत्यापित नसेल, तर ते स्पष्टपणे नमूद करू. जर चूक आढळली, तर ती स्वीकारून दुरुस्त करू. कारण विश्वासार्हता ही लोकप्रियतेपेक्षा अधिक महत्त्वाची आहे.
या मालिकेतील प्रत्येक प्रतिमा केवळ प्रेरणा देण्यासाठी नाही, तर विचार, विवेक आणि सत्याचा संवाद घडवण्यासाठी आहे.
आमची निष्ठा कोणत्याही व्यक्ती, विचारसरणी किंवा प्रसिद्धीशी नाही.
आमची निष्ठा सत्याशी आहे.
आमची पाच तत्त्वे
सत्य प्रथम
संदर्भाशिवाय दावा नाही
चूक आढळल्यास त्वरित सुधारणा
वाचकाच्या बुद्धिमत्तेचा आणि विवेकाचा आदर
ज्ञान सर्वांसाठी, अहंकार कोणासाठीही नाही
शेवटची ओळ
"प्रतिमा लोकांना थांबवेल; सत्य त्यांना पुढे नेईल."
..................................
— संपादकीय मंडळ
विजय मयान विचार
येथे मतांपेक्षा पुराव्याला आणि प्रसिद्धीपेक्षा सत्याला जास्त महत्त्व दिलं जातं.विजय गायकवाड
झेंडा उंचा रहे हमारा" हे गीत गात मिरवणुका काढू लागली,हसतमुखाने तुरुंगात गेली.अल्प शिक्षण घेतलेली आणि हातावर पोट अवलंबून असलेली.
बाबू गेनूसारखी माणसे मातृभूमीच्या भक्तीने धुंद होऊन जीवाची कुरवंडी करायला सिद्ध झाली. विश्वविद्यालयाच्या उच्च परीक्षांत चमकलेली माणसे खादीविक्री आणि हरिजन सेवा यांच्यासाठी खेडोपाडी पायी फिरण्यात आनंद मानू लागली, "म्हणती स्त्रिया रणी जाऊ ! त्यजिती मुले दिला खाऊ" अशा प्रकारचे तप्त धुंद वातावरण सर्व देशात निर्माण झाले.साहजिकच मातीचा थंड गोळा वाटणारा सामान्य मनुष्य धगधगू लागला,समाजाच्या पायातल्या विविध अवजड, गंजलेल्या शृंखला आपल्याला तोड़न टाकायच्या आहेत या नव्या भव्य स्वप्नाने तो भारला गेला.१९२० ची असहकारितेची चळवळ,१९३० ची मीठ सत्याग्रहाची चळवळ आणि १९४२ ची 'चलेजाव' ची चळवळ यांच्याशी ज्यांचा थोडा फार संबंध आला असेल,निदान जे या चळवळीचे सहृदय साक्षी असतील त्यांना आजकाल एक गोष्ट तीव्रतेने जाणवल्यावाचून रहात नाही,ती म्हणजे त्या काळात सामान्य मनुष्यात निर्माण झालेले चैतन्य,एका विशाल ध्येयाचा त्याच्या जीवनाला झालेला परीसस्पर्श! ते चैतन्य आज अस्तित्वात आहे काय? या प्रश्नाचे प्रामाणिकपणाने उत्तर द्यायचे असेल तर गांधीजींनी ज्या मातीतून माणसे निर्माण केली,त्या मातीत ती पुन्हा मिसळून गेली आहेत हे मान्य केल्याशिवाय गती नाही! प्रभू रामचंद्रांनी आपल्या पदस्पर्शान शिलारूप झालेल्या अहिल्येचा उद्धार केला अशी कथा आपण वाचतो प्रभू रामचंद्र त्या वनातून निघून गेल्यावर अहिल्येची पुन्हा शिळा झाल्याचा विपरीत चमत्कार कोणत्याही रामायणात नमूद केलेला नाही! या देशात गेल्या वीस वर्षांत जे महाभारत घडले त्यात मात्र या विचित्र चमत्काराचे चित्र कुठे स्पष्ट दिसल्यावाचून रहात नाही.
नवा माणूस निर्माण व्हायला हवा.
गांधीजी नव्या माणसाची जी मूर्ती घडवायला निघाले होते,तिचे स्वरूप एकांगी नव्हते.या नव्या माणसाची स्वातंत्र्याची किंवा सुखाची कल्पना स्वतःपुरतीच मर्यादित असणे गांधींना मंजूर नव्हते. "ते स्वातंत्र्य खरे न फक्त अपुली जे तोडिते बंधने। अन्यांच्या पदशृंखलांस बघते निष्कंप ऐशा मने।" या ओळीत 'बी' कवींनी व्यक्त केलेली भावना त्यांना पूर्णपणे अभिप्रेत होती.माणसाचे राजकीय, सामाजिक, आर्थिक, वैचारिक, भावनिक असे तुकडे पाडणे म्हणजे त्याच्या आत्म्याचे तुकडे करण्यासारखे आहे,याची अत्यंत तीव्र जाणीव त्यांच्या ठायी सदैव जागृत होती.ही विविध अंगे असलेला मनुष्य मूलतःएकजीव आहे आणि म्हणून त्याच्या सर्व आविष्कारांत सुसंगती अवश्यमेव हवी,असा त्यांचा अट्टाहास होता.पारतंत्र्याच्या शृंखलांइतक्याच अस्पृश्यतेच्या बेड्या माणुसकीला मारक ठरतात.नवकोट नारायण आणि अठरा विश्वे दरिद्री यांच्यातल्या भेदाइतकाच जातिभेद किंवा वंशभेद अमानुष आहे; म्हणून आता जो नवा माणूस निर्माण व्हायला हवा,त्याने सर्व प्रकारच्या विषमतेविरुद्ध बद्धपरिकर (सिद्ध) झाले पाहिजे,असे गांधीजींचे स्वप्न होते.गांधींनी देशाला अनेक चांगल्या प्रेरणा आणि प्रवृत्ती दिल्या.पण त्यांतली सर्वात मोठी देणगी म्हणजे सामाजिक धर्मबुद्धीची जाणीव ही होय. जगप्रसिद्ध इतिहासकार टॉइन्बी याने असे म्हटले आहे की कोणत्याही राजकीय तत्त्वज्ञानाने मनुष्याचे जीवन सुखी होणार नाही,त्याच्या ठिकाणी जी सुप्त धर्मबुद्धी असते आणि जिच्यामुळे तो भोवतालच्या जगाचा स्नेहशील घटक बनतो.तिचा विकास हाच यापुढे स्वार्थ, संघर्ष,असंतोष आणि महायुद्धे यांच्या काळ्याकुट्ट छायेत वावरणाऱ्या माणसाला खराखुरा दिलासा देऊ शकेल.
स्वातंत्र्योतर काळात या सामाजिक धर्मबुद्धीचे परिपालन आपल्याकडून झाले काय,हा खरा प्रश्न आहे. ही धर्मबुद्धी जागती ठेवणे हे जसे गांधीजींच्या कर्तृत्वाची फळे चाखणाऱ्या त्यांच्या छोट्या-मोठ्या अनुयायांचे काम होते,तसेच गांधीजींच्यामुळे ज्याला जीवनातल्या चैतन्याचा आणि मांगल्याचा साक्षात्कार घडला त्या सामान्य मनुष्याचेही कर्तव्य होते.पण काही अपवाद वगळता सामाजिक धर्मबुद्धीच्या बाबतीत या दोन्ही वर्गांनी गांधींना दगा दिला,असेच प्रचलित वैफल्यावरून वाटते.
याचा अर्थ या देशात गेल्या वीस वर्षात प्रगतिपर असे काही घडले नाही असे नाही.सामाजिक विकासाच्या पाश्चात्त्य मोजमापांनी पाहिले तर आपण बरीच धडपड केली आहे.आकडेशास्त्राच्या आधारेच बोलायचे असेल तर गेल्या वीस वर्षाची वकिली करणे सोपे आहे. साक्षरता इतकी वाढली,दरडोई उत्पन्न अमुकपट झाले आहे.कुटुंब नियोजनावर इतके कोटी रुपये खर्च होत आहेत,इत्यादी तपशील खुलासेवार खुलवून सांगायला चतुर वक्त्याची जरूर आहे असे नाही.
ही समृद्धीची गंगा तळाच्या तहानलेल्या भूमीपर्यंत पोहचली आहे काय ?हा तपशील कुणीही अमान्य करणार नाही. शतकानुशतके विज्ञानाकडे पाठ फिरवून बसल्यामुळे आपण साध्यासुध्या गरजांच्या बाबतीतसुद्धा करंटे बनून गेलो होतो.स्वातंत्र्य मिळाल्यावर आपण विज्ञानसन्मुख झालो.
त्याच्या सहाय्याने भौतिक समृद्धी निर्माण करण्याच्या मार्गाला लागलो.या प्रयत्नांत द्रष्टेपणाच्या अभावी काही दोष निर्माण झाले असतील,इथली माती,इथला माणूस, इथल्या शक्ती आणि इथल्या मर्यादा यांचा विचार जसा व्हावा तसा झाला नसेल,औद्योगिक शक्ती ही एक प्रचंड राक्षसी शक्ती आहे.अल्लाउद्दिनाच्या दिव्याप्रमाणे ती क्षणार्धात राजवाडा निर्माण करू शकते,पण या राक्षसी शक्तीच्या जबड्यात सापडलेला मनुष्य एका अजस्त्र यंत्रातला अनामिक खिळा बनून जातो, भावनिक जीवनाला पारखा होतो,शरीरसुखे हात जोडून पुढे उभी असूनही त्याचे मन एका भयानक पोकळीत फडफडत राहते.
इत्यादी गोष्टींकडे आवश्यक तेवदे लक्ष दिले गेले नसेल. हे सारे एक वेळ स्वाभाविक मानता येईल.कारण यांतले अनेक प्रश्न आजच्या भारताचे नसून उद्याच्या भारताचे आहेत,मूलतः ते साऱ्या जगाचेच आहेत! पण ही भौतिक समृद्धीची धडपड सुरू असताना गांधीजींनी जागृत केलेली सर्वसामान्य मनुष्याची सामाजिक धर्मबुद्धी उजळ आणि निर्मळ राहिली आहे काय? का त्या ज्योतीने काजळी धरली आहे? दैनिके वाचताना, सभासंमेलनाचे कार्यक्रम पाहताना भाणि सर्व क्षेत्रांतल्या पुढाऱ्यांची भाषणे ऐकताना सर्वत्र आबादीआबाद आहे असा भास होतो! गांधीजींना अभिप्रेत असलेल्या सामाजिक धर्मबुद्धीचा अंकुर उगवला तोच करपून गेला याची खंत कुणाला वाटत असलेली आढळत नाही.पण सार्वजनिक भाषणे,दर्शन,प्रदर्शने ही रंगमंचावरील नाटके असतात हे लक्षात घेऊन दैनंदिन सामाजिक जीवनाचे, संभाषणाचे मनोगतांचे आणि स्थित्यंतरांचे आपण निरीक्षण करू लागलो तर काय अनुभव येतो? साक्षरता झपाट्याने वाढत आहे. शिक्षणप्रसाराला भरती आली आहे.पण शहरी व ग्रामीण समाज सुसंस्कृत होत असल्याची चिन्हे मात्र कुठेच दिसत नाहीत! पदवीधरांच्या कारखान्यातून भरपूर माल बाहेर पडत आहे,पण ज्ञान विज्ञानाच्या आणि कला शास्त्रांच्या उपासनेत गढून गेलेले तरुण दुर्मीळ आहेत.बौद्धिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातली शिखरे गाठण्याकरता जीवाची कुरबानी करणारे शोधूनही मिळणे मुष्किल आहे.दरडोई वार्षिक उत्पन्न वाढले हे खरे! पण वाढती महागाई लक्षात घेता सामान्य मनुष्याचे जीवनमान उंचविण्याची शक्ती या आकड्यांच्या मायाबाजारात आहे काय? देशात निर्माण झालेली समृद्धीची गंगा सामाजिक तळाच्या तहानलेल्या भूमीपर्यंत जाऊन पोहचली आहे काय? या किंवा अशा प्रकारच्या अनेक प्रश्नांची उत्तरे उघड आहेत.डॉ. राममनोहर लोहियांसारख्या दलितांच्या झुंजार कैवाऱ्यांनी ती पूर्वीच परखडपणे व्यक्त केली आहेत !
गांधीजींना समाजाचे तसेच व्यक्तीचेही परिवर्तन हवे होते.
दुसऱ्या एका बाजूने गांधीजींना अभिप्रेत असलेल्या सामाजिक धर्मबुद्धीचा विचार करता येईल. स्वातंत्र्यपूर्वकाळातले शिक्षक,डॉक्टर,वकील,व्यापारी, पत्रकार,साहित्यिक,कलावंत इत्यादिकांच्या जीवनक्रमात देशभक्तीच्या भावनेचे जे सहजस्फुरण दृग्गोच्चर होत असे ते आजकाल दुर्मीळ का व्हावे? आजच्या गरिबांच्या जगात अमृताहूनही दुष्प्राप्य झालेले तूप आपल्या पोळीवर ओतून घेण्याची अहमहमिका जुने श्रीमंत आणि नवे धनिक यांच्यामधे किळसवाण्या रीतीने का प्रगट होत आहे? काटेकोर कायदे होऊनही ठिकठिकाणी हरिजनांचा अमानुष छळ होत असल्याच्या वार्ता कानावर का पडतात.? स्वातंत्र्योत्तर काळात श्रीमंत अधिक श्रीमंत झाले आणि बहुसंख्य गरीब अधिक गरीब झाले हे सिद्ध करायला अर्थशास्त्रज्ञ कशाला हवेत? लोकशाही समाजवादाचे ढोल आणि गांधीजींच्या राष्ट्रपितृत्वाचे नगारे कानीकपाळी बडविले जात असताना आर्थिक विषमतेची दरी अधिक रुंद आणि अधिक खोल का होत आहे?
भरतीच्या वेळी समुद्राचा किनारा अवखळपणाने पुढे धावणाऱ्या आणि फेसाळत फुटणाऱ्या लाटांनी भरून जातो.जिकडे तिकडे पाणीच पाणी दिसू लागते.पण ओहोटी सुरू झाली की हे सुंदर,उत्साहवर्धक दृश्य पार पालटून जाते ! समुद्राचे पाणी मागे हटू लागते. किनाऱ्याचा रुंद पट्टा उघडा पडल्यामुळे भकास भासू लागतो.भरतीच्या पाण्याने लपविलेल्या किनाऱ्यालगत लहान मोठे खडक उघडे पडून या दृश्याच्या उदासपणात भर घालतात.
किनाऱ्यावर पाचोळा आणि इतर घाण इतस्ततः पडलेली दिसते.नकळत हे सर्व प्रेक्षकाला निरुत्साही बनविते.
आजची भारतीय मनुष्याची परिस्थिती आणि मनःस्थिती यांचे जे चित्र दिसते,ते या ओहोटीच्या दृश्यासारखेच आहे काय ?
जीवनाची सामाजिक आणि आर्थिक बांधणी परंपरागत मार्गापेक्षा अत्यंत भिन्न पद्धतीने सुरू झाली आहे.या नावीन्यात आजच्या विफलतेचा उगम असेल काय? इमारत बांधली जात असताना डोळ्यात भरत नाही.ती वेडीवाकडी,ओबडधोबड भासते.रंगरंगोटी करून पूर्ण स्वरूपात ती समोर उभी राहिली म्हणजे सुंदर वाटते. आज सर्वसामान्य माणसाचे मन निरुत्साही आणि जीवन प्रवाहपतित झाले आहे.याचे मूळ संक्रमणाच्या वेगातून असू शकेल काय?
गांधीजींच्या स्वप्नांतला हा नवा भारतीय माणूस का गुप्त झाला?
गांधीजींना जसे समाजाचे तसेच व्यक्तीचेही परिवर्तन हवे होते.देशाच्या राजकीय घडीप्रमाणे त्याची आर्थिक शैक्षणिक,
सामाजिक आणि सांस्कृतिक घडीही निराळ्या पद्धतीने बसविण्याचे स्वप्न त्यांनी सतत उराशी बाळगले होते.त्या दिशेने त्यांनी विविध उपक्रम सुरू केले होते. पण सर्व प्रकारच्या विषमतेपासून अलिप्त असलेले परिवर्तन हवे असेल,तर त्याला आधारभूत असलेल्या मूल्याची प्राणपणाने जपणूक करणारा मनुष्यही निर्माण झाला पाहिजे,हे ते पुरेपूर जाणून होते.त्या दृष्टीने त्यांनी केलेले प्रयत्न अल्पप्रमाणात का होईना यशस्वी होत असल्याचा भास होत होता.
पण १९४८ नंतर गांधीजींच्या स्वप्नातला हा नवा भारतीय माणूस एकाएकी गुप्त झाला.तो खरोखर अस्तित्वातच आला नव्हता काय,ही शंका आज अनेकांना बेचैन करीत आहे की प्रखर उन्हात मृगजळाचा भास व्हावा त्याप्रमाणे गांधीजींच्या तेजस्वी व्यक्तिमत्त्वामुळे त्यांच्या शिकवणुकीच्या कक्षेत आलेली माणसे त्या काळापुरतीच बदलली होती?या शेवटच्या प्रश्नातून एक मूलभूत प्रश्न डोळ्यांपुढे उभा राहतो. वासना आणि विकार यांचे अस्तित्व ही माणसाची प्रकृती आहे.जागृत आत्मशक्तीचे लेणे लाभलेल्या निवडक व्यक्ती या प्रकृतिधर्मावर विजय मिळवू शकतात,पण सर्वसामान्य माणसाचे अंतरंग गांधीजींना हवे होते.तसे बदलणे शक्य आहे काय? संत,प्रेषित,क्रांतिकारक आणि मांगल्याचे उपासक हे स्वभावतःच स्वप्नाळू असतात.निर्दोष मानवी संस्कृतीचे एक रम्य, भव्य स्वप्न त्यांच्या डोळ्यांपुढे तरळू शकते. "ईशावास्यमिदं सर्वम" हे अधिकारवाणीने सांगणाऱ्या वैदिक ऋषींनी हे स्वप्न पाहिले होते! बुद्ध,ख्रिस्त आणि ज्ञानेश्वर,
कबीर यांच्या प्रज्ञेलाही त्याचे दर्शन झाले होते.अगदी अलीकडच्या काळात टॉलस्टॉय टागोरांसारखे प्रतिभावंत या स्वप्नाच्या ध्यासाने धुंद झालेले आपण पाहिले आहेत.दैनंदिन क्रियाशील जीवनात गांधीजी याच स्वप्नाचा मागोवा घेत राहिले,त्यांच्या हयातीत हे स्वप्न वास्तवाच्या कुशीत विसावण्याकरता येत आहे, असा गोड भास लक्षावधी लोकांना झाला.पण गेल्या वीस वर्षांतला प्रत्यक्ष अनुभव अगदी निराळा आहे.भारतीय संस्कृती आणि गांधीजींची शिकवण ह्या दोन तटांमधून वाहू लागलेली ही निर्मळ स्वप्नसरिता अवघ्या दीड तपात पूर्णपणे गढूळ होऊन जाईल.ज्या मूल्यांपुढे पिढ्यानपिढ्या लोक नतमस्तक होत होते ती सर्व हा हा म्हणता पायदळी तुडविली जातील. त्याग आणि सेवा या मंत्रांचे पठण जिथे सुरू होते,तिथे भोग आणि स्वार्थ यांच्या नंग्या नाचाला टाळ्या पडत राहतील,भ्रष्टाचार आणि काळाबाजार ही जीवनाची अविभाज्य अंगे हेऊन बसतील,असे भविष्य १९४७ पूर्वी कुणी वर्तविले असते,तर त्याची निःसंशय वेड्यात गणना झाली असती.
आंतरिक प्रकाशाची पूजा
मात्र आज सभोवतालचे दाहक वास्तव करुणरवाने एकच गोष्ट सांगत आहे ती ही की गांधीजींच्या काळात भारतीय मनुष्याचे अंतरंग बदलत आहे,असे जे दृश्य दिसत होते,तो केवळ एक भास होता!
"मनुष्याच्या अंतरंगात नेहमीच एक पशु दबा धरून बसलेला असतो." असे शोपेनहारने म्हटले आहे. भारतीय मनातल्या या पशूला काही काळ माणसाळविण्याचे काम गांधींनी केले. पण स्वातंत्र्य मिळून सत्ता आणि संपत्ती यांची प्रलोभने पुढे येताच त्या पशूचा हिंस्रपणा पूर्णत्वाने जागा झाला!
माणसातले पशुत्व आणि माणुसकी यांचा हा संघर्ष सनातन आहे.त्याचे अस्तित्व प्रत्येक व्यक्तीने आणि प्रत्येक पिढीने मान्य केले पाहिजे.हे अस्तित्व हेच एका दृष्टीने संस्कृतीचे उगमस्थान आहे.आजची मानवी संस्कृती शतकानुशतके समर्थ सज्जनांनी केलेल्या उग्र तपश्चर्येचे फळ आहे.माणसाची प्रकृती आणि मानवी संस्कृती यांच्यामधल्या संघर्षाचे सूत्र कालमानानुसार बदलले,तरी तो संघर्ष जसा अनादी तसाच अनंत आहे. शिवाय हीही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की कोणतीही नवी संस्कृती चटकन् समाजाच्या पचनीं पडत नाही. तिचा जेवढा अंश सर्वसामान्य माणसाच्या प्रकृतीमध्ये मिसळून एकरूप होतो,तेवढाच समाज परिवर्तनाला पोषक ठरतो.
गांधीजींच्या मागून तितक्याच समर्थपणाने सामाजिक धर्मबुद्धीची बीजे जनमनात फुलवीत रहाणारा प्रभावी नेता भारताला मिळाला असता तर आज अगतिक झालेल्या आपल्या सामाजिक मनाची ही दुर्दशा कदाचित टळली असती.पण इतिहास उच्चरवाने नेहमीच सांगत आला आहे."सारे महापुरुष एकाकी असतात.! त्यांना त्यांच्या तोडीचे वारस कधीच लाभत नाहीत. महामानवांची परंपरा अखंडित राहणे नियतीला मंजूर नाही."
ते काहीही असो! ज्या सामान्य मनुष्यावर गांधीजींनी जीवापाड प्रेम केले,त्यांनी सभोवताली पसरलेल्या दाट धुक्यातही आकाशात सूर्य प्रकाशत आहे ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे.तत्कालिक सुखाच्या हव्यासाने उफाळून येणाऱ्या मनोविकारांचा माणूस गुलाम झाला,तर या यांत्रिक युगात तो आपला आत्मा पूर्णपणे गमावून बसेल!ज्या समाजाला श्रेष्ठ प्रकारचे नैतिक अधिष्ठान असते,तिथेच असामान्याप्रमाणे सामान्यानाही समृद्धी आणि शांती यांचा लाभ होण्याची शक्यता अधिक असते.नैतिक मूल्यांचे परिपालन ही गांधीजींच्या दृष्टीने सर्व मानवी व्यवहार सुखप्रद होण्याची गुरुकिल्ली आहे म्हणून भोवताली दिसणाऱ्या विपरीत दृश्यांनी मन गोंधळू न देता गांधीजींनी दिलेला मूल्यांच्या जपणुकीचा वारसा यथाशक्ति संभाळणे हे प्रत्येक सामान्य मनुष्याचे कर्तव्य आहे.
यासाठी त्याला अंतर्मुख व्हावे लागेल,त्याग करावा लागेल,
सामाजिक धर्मबुद्धीच्या ध्रुवताऱ्यावर दृष्टी ठेवून आपली जीवननौका हाकारावी लागेलं.कठोर कायद्यांनी किंवा रक्तरंजित क्रांतीने समजाचे बाह्यरूप बदलते.पण त्याचे अंतरंग तसेच रहाते.
विज्ञानाचे राक्षसी सामर्थ्य आणि यंत्रयुगामुळे निर्माण होणारी भावनांची शुष्कता यांच्या कात्रीत सापडून मानवी आयुष्य हे केवळ जंतूचे जीवन होऊ नये असे ज्याला ज्याला वाटत असेल, त्याने त्याने सामाजिक धर्मबुद्धीशिवाय मानवाला यापुढे दुसरा तरणोपाय नाही, हे लक्षात ठेवले पाहिजे.
भारतीय मन गेल्या वीस वर्षांत ज्या आंतरिक प्रकाशाच्या पूजेला अंतरले आहे,त्याचा या गांधी जन्मशताब्दीच्या वर्षात आपण सर्वांनी पुन्हा शोध केला पाहिजे,हा प्रकाशच आजच्या असुरक्षित जगात सामान्य मनुष्याचा खराखुरा आधार होऊ शकेल.
…………..।।।।……
१,२ : हा लेख १९६९ साली 'धरती' या विशेषांकात प्रसिद्ध झालेला असल्याने त्या काळानुसार आलेले संदर्भ.
|| २ ||
अलीकडेच तरुण पिढीच्या काही प्रतिनिधींशी मनमोकळेपणाने गप्पा गोष्टी करण्याचा योग आला.हे सारे विद्यार्थी होते.पदवीधर झालेले आणि पुढील विद्याभ्यासात व पसरलेल्या अफाट विश्वाचं निरीक्षण करू लागावं त्याप्रमाणं आजच्या कडू गोड जीवनाचा सामाजिक सुखदुःखांत रस घेणारे,पंख फुटलेल्या पिलांनी घरट्याबाहेर पडून सभोवताली अनुभव घेणारे आणि त्याचा अन्वयार्थ लावण्याचा प्रयत्न करणारे असे हे तरुण होते.बोलता बोलता तरुण पिढीच्या सध्याच्या वैफल्याच्या मुळाशी कोणकोणती कारणे आहेत हा विषय निघाला.आपल्या मनातील सारी शल्यं त्यांनी सांगावीत म्हणून ती थोडक्यात शब्दबद्ध करण्याची मी त्यांना विनंती केली.आढेवेढे न घेता त्यांनी आपले टिपण माझ्याकडं दिलं.
या तरुण अंतःकरणांना सलणाऱ्या अनेक शल्यांपैकी एक त्यांच्याच शब्दांत सांगतो.
"केवळ तात्त्विक चर्चा करणारे पण ती तत्त्वे आचरणात न आणणारे मागच्या पिढीतले लोक,विशेषतः केवळ भाषणबाजी करणारे गांधीवादी आम्हाला भेटतात,त्या वेळी आम्हाला त्यांच्याविषयीच नव्हे तर त्यांच्या तत्त्वज्ञानाविषयी आणि पर्यायानं गांधींविषयी घृणा निर्माण होते."
गांधी जन्मशताब्दीचे समारंभ आता सर्वत्र साजरे होत असताना सुबुद्ध आणि सुशिक्षित तरुणांच्या तोंडून “आम्हाला गांधीविषयी घृणा वाटते." असे शब्द निघावेत याचं मला जितकं आश्चर्य वाटलं तितकंच दुःख झालं. स्वभावतः मी व्यक्तिपूजक नाही.
विभूतिपूजेच्या प्रथेमुळे भारतातल्या सामान्य मनुष्याचं मनं खुरटं राहिलं आहे याची जाणीव मला आहे.त्यामुळं टिळक - गांधी असोत अथवा गेल्या दीडशे वर्षात आपल्या देशात होऊन गेलेले इतर थोर पुरुष असोत,त्यांच्याविषयी माझ्या मनात अत्यंत आदर असला तरी अंधभक्ती मात्र मुळीच नाही. प्रत्येक महापुरुषाचं जीवन भविष्यकालावरच्या निकषांवर घासलं गेल्यानंतर मगच त्यात सोनं किती आणि हीण किती हे कळू शकतं;हे सत्य मला अपरिचित नाही.पण गांधीजींच्या अभूतपूर्व कर्तृत्वाच्या काळात विशीपासून पन्नाशीपर्यंत माझं आयुष्य गेलं. साहजिकच,या तरुणांच्या मनातली गांधीजींविषयीची अप्रीती (घृणा हा शब्द त्यांनी अनवधानानं वापरला असावा असं मी समजतो) चटकन् समजावून घेणं मला कठीण गेलं.
या तरुण मंडळींचा हा राग पूर्वग्रहदूषित नव्हता.ज्याचं जळतं त्याला कळतं हे मनाला जाणवण्याइतकी त्यांच्या अंतरींची व्यथा स्पष्ट दिसत होती.
मी त्यांच्या आक्षेपांचा विचार करू लागलो. पहिला प्रश्न होता गांधीवादाचा.त्याचं उत्तर गांधीजींच्या शब्दांत देणं फार सोपं काम आहे.गांधीवाद म्हणून एक स्वतंत्र तत्त्वज्ञान आहे हे खुद्द गांधींनाच मान्य नव्हतं।
अपुरे राहिलेला भाग पुढील लेखामध्ये….।