* विजय गायकवाड | Vijay Gaikawad

live

नमस्कार आपले स्वागत आहे. मी पुस्तके आणि मित्रांवर पैसे खर्च करतो,माझ्याकडे दगड आणि विटांवर खर्च करण्यासाठी पैसे नाहीत.- रस्किन बाँड.ही थोर माणसं व त्यांचे विचार मला पुस्तकात भेटलीत.ती भेटली आणि त्यांनी सांगितले कि, प्रत्येक दिवशी असं काही तरी करा की,ते तुम्हाला अधिक सुंदर उद्याच्या दिशेने खूप लांबवर घेऊन जाईल."- डोग फायरबाऊ.' सर्वियन कादंबरीकार मिलोराद पावीच यांचे एक वाक्य आहे ते म्हणतात - जोवर जगात पुस्तक वाचणाऱ्या वाचकांची संख्या बंदूकधारी सैनिका पेक्षा अधिक आहे तोवर काळजीच काहीच कारण नाही.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात.पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये.म्हणून अविरतपणे प्रयत्न करणारे मार्गदर्शक, मित्र धावून येतात.प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,डॉ.दीपक शेटे,आ.भरत बुटाले,प्रा.सर्जेराव राऊत,सुभाष ढगे,अनिल फारणे,डॉ.सुधीर सरवदे ,विश्वास खाडे, विनायक पाटील,संजय कुंभार,सतीश खाडे,मनोहर सुर्वे,गणेश खंदारे,तात्या गाडेकर, दादासाहेब गाडेकर, दादासाहेब ताजणे, पुस्तकातील घटना प्रसंग सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील यांनी केलेले आहे. मला लिहिण्याची प्रेरणा देणारी पुस्तके,लेखक,प्रकाशक,मित्र ही जगावेगळी माणसं माझ्या जीवनातील महत्वाचा टप्पा आहेत.... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ.मेघा गायकवाड, चिरंजीव मयान,माझ्या धावण्यातील गुरुवर्य नामदेव बरुरे,लुल्ला शेख मोठी ताई ,लहान ताई जयश्री शिंदे या सर्वांचेच मनापासून आभार व धन्यवाद मॅट्रिक फेल विजय गायकवाड

7/1/26

सोन्याचा पिंपळ / Golden Peepal

वटवृक्षाप्रमाणं पिंपळाचं झाडही विशाल असतं.मात्र वडाप्रमाणं या वृक्षाला पारंब्या नसतात.त्यामुळं पिंपळाचा विस्तार कमी असतो.परंतु विस्ताराची भरपाई पिंपळानं उंचीत भरून काढली आहे.वडाखाली असतो,तसा दाटपणा आणि अंधार पिंपळाखाली नसतो.

काक विष्ठेचे झाले पिंपळ ।

म्हणून कावळे उंचावर बसून जिथं जिथं विष्ठा टाकतात, तिथं तिथं पिंपळाची लहान रोपं वाढताना दिसतात.ही रोपं इमारती आणि मंदिरं यांच्या भिंतींच्या फटींतून वाढतात.

जंगलात फिरताना तुम्हाला पिंपळाची रोपं झाडांवर बांध्यांप्रमाणं वाढलेली दिसतील.पुढं या रोपाची वाढ होताना दोरीसारख्या मुळ्या साऱ्या झाडाला घट्ट आवळून टाकतात.

पिंपळाची पानं दिसायला मोठी सुंदर असतात.पानांकडं पाहिल्यावर वाटतं,एखादा बांधेसूद पुरुष साकार होतोय. पानाच्या दोन्ही किनारी बाहेरच्या दोन्ही बाजूंना आडव्या जातात (खांदे).नंतर आतल्या बाजूला घेऊन शेवटीएका टोकापाशी येऊन मिटतात (कंबर).जणू लहान, नाजूक कटीवरचं एखादं रुंद चौकोनी धडच.पानांचे देठ लांब असल्यामुळे ती लोंबताना दिसतात.

थोडीशी जरी वाऱ्याची झुळूक आली,तरी ती सळसळू लागतात. म्हणून संस्कृतात पिंपळाला चलदल म्हटलं आहे.

मार्च महिन्यात त्याची पानगळ सुरू होते.एक-एक पान गळायला लागतं.संत कबीर जिथं मागावर विणायला बसायचा,तिथल्या समोरच्या खिडकीतून एखाद्या राईतील पिंपळाचं झाड दिसत असावं.वर्षानुवर्ष त्यानं त्या झाडाची पानगळ होताना पाहिली असणार ! त्या निरीक्षणातूनच त्याचं काव्य बाहेर आलं असावं.

पान पडत यो कहै सुनि तरुवर ! बणराई! 

अबके बिछुरे ना मिले,दूर पडेंगे जाई 

रुखडा बोले पानसे,सुन पत्ते । मेरी बात

 इस घर की यह रीति है;इक आवत इक जात !!

नंतर पिंपळाला तांबूस कोवळी पानं फुटू लागतात.याच वेळी झाडाच्या डहाळ्या पिकल्या पिंपरांनी लवून जातात.हरोळ्या,तांबट,हरिद्र,धनेश,पोपट,बुलबुल असे किती तरी पक्षी फळं खाण्यासाठी झाडावर येतात. परंतु सर्वाधिक आनंद होत असेल, तर तो पळस मैनांना. त्या थव्याथव्यांनी पिंपळावर उतरतात अन् पिंपरं आवडीनं खातात. 

एक कळप गेला,की दुसरा येतो.हळूहळू कोवळी पानं वाढत वाढत पिवळसर दिसू लागतात.हळूहळू त्यांवर सोनेरी झाक येऊ लागते.

एका चैत्री पुनवेला मी मेळघाटातल्या वनविश्रामगृहात थांबलो होतो.जिकडंतिकडं चंद्राचा रुपेरी प्रकाश पडला होता.मी व्हरांड्यात वेताच्या खुर्चीवर बसून समोरच्या पिंपळाकडं पाहात होतो.पिंपळाच्या पानापानांवर चांदण्यात सुवर्णदीपांची कांती चमकत होती.मी त्या दृश्याकडं ध्यानमग्न होऊन पाहात होतो.

प्रभात समयी पिंपळामागून उगवणाऱ्या सूर्यकिरणांनी त्या पानांना सोन्याच्या रूपात बदलून टाकलं. ्तेव्हा मला संत तुकारामांच्या

'जयाचिये द्वारी सोन्याचा पिंपळ'

या अभंगाचा प्रत्यय आला.

जंगलात पक्षिनिरीक्षण करताना वाऱ्याची झुळूक नसली,तरी पिंपळाची पानं सारखी सळसळत असतात. जणू मी उन्हातून जंगलात फिरत असताना माझं लक्ष वेधून मला सावलीत येण्यासाठी ती पालवीत असत. तिथल्या वातावरणात थंडगार वायुलहरी पसरत. दुपारच्या वेळी झाडाखाली उताणा पडून मी निळ्या आभाळाकडं पाहात राही.त्या वेळी मला आकाशाचं आगळंवेगळं सौंदर्य जाणवे.सळसळत्या पानांचं अंगाईगीत ऐकत-ऐकत मला केव्हा डोळा लागे,हे कळत नसे.पावसाच्या थेंबांच्या आवाजानं मी जागा होऊन वर बघतो,तो पिंपळाच्या लांबसडक,

पातळ डहाळ्या सारख्या एकमेकांवर आदळून हा आवाज निर्माण झालेला असे.

जपान देशात छान प्रथा आहे,नवीन वर्षाच्या सुरुवातीला बुद्ध मंदिरातील घंटेचा आवाज ऐकायला जायचं.प्रत्येक मंदिरातील घंटेचा नाद व लय वेगळी.तसंच मला सर्व ऋतूंत पिंपळपानाची साद ऐकण्याचं आकर्षण आहे.

मंदिरातील सतत वाजणाऱ्या घंटेच्या नादात कधी पुनरावृत्ती नसते.देवळासमोरच्या पिंपळाचा घोषनाद एखाद्या चांदीच्या किणकिणणाऱ्या घंटीच्या नादासारखा वाटतो.पिंपळाची सळसळणारी पानं वातावरणात एक प्रकारची नादमाधुरी ओतीत असतात.नदीकाठच्या पिंपळाची सळसळ नदीच्या संथ प्रवाहाला साथ देते. सागरकिनाऱ्यावरच्या पिंपळाची सळसळ आणि तिला साथ देणारी सागराची गाज यांतला कुठला आवाज गूढ आहे,हे सांगता येत नाही.घरासमोरच्या पिंपळाची सळसळ अंगाई गीताप्रमाणं वाटते.

पिंपळ जसा पाखरांना अन्न देतो,तसा घरट्यासाठी आसराही देतो.पावसाळ्यात पिंपळाच्या झाडावर बगळे, ढोकरी,

पाणकावळे समूहानं घरटी बांधून पिलांना जन्म देतात.या सारंगागारांप्रमाणे काकागारंदेखील गावातल्या पिंपळावरच असतात.नागझिराजवळच्या मंगेझरी गावातील विशाल पिंपळावर मोरकुंचाची दोन-तीन घरटी असायची.ब्रह्मा,विष्णु आणि महेश या तीन देवांचा या वृक्षाशी संबंध,म्हणून हे झाड पूज्य मानलं जातं. भगवद्‌गीतेमध्ये विभूतियोगामध्ये 'वृक्षांमध्ये मी पिंपळ आहे,असं श्रीकृष्णानं म्हटलं आहे.

श्रीकृष्ण आयुष्याच्या शेवटच्या कालखंडात याच वृक्षाच्या सावलीत ध्यानाला बसला असता,त्याचे पाय हरणाच्या मुखासारखे वाटल्यामुळं पारध्यानं तिथं बाण मारला.त्यामुळं श्रीकृष्णाचा त्यात अंत झाला.

राजकुमार सिद्धार्थ या वृक्षाखाली बसून साधना करीत असता त्याला साक्षात्कार झाला.तेव्हापासून तो बुद्ध म्हणून ओळखला जाऊ लागला.पिंपळाचं झाड बोधिवृक्ष म्हणून संबोधलं जाऊ लागलं.ही घटना इ.स. पूर्व २८८ मधील आहे.

जातककथा,बुद्धाच्या पूर्वजन्माच्या दंतकथा आणि बौद्धकालीन शिल्पं यांत अनेक बोधिवृक्षांचा उल्लेख असल्याचं पुरातत्त्वज्ञ कनिंगहॅम यांनी निदर्शनास आणून दिलं आहे.पिंपळ हा शाक्य मुनींचा,वटवृक्ष हा काश्यप मुनींचा,औदुंबर हा कनक मुनींचा,शिरीष वृक्ष हा क्रकुच्छंदांचा,शालवृक्ष हा विश्वबाहूचा,असे बोधिवृक्षांचे उल्लेख आढळून येतात.

राजकुमार सिद्धार्थ याला झालेल्या साक्षात्काराविषयी बरंच संशोधन झालं आहे.लिअल वॅटसन (Lyall Wastson) आपल्या 'द बायॉलॉजी ऑफ डेथ' या ग्रंथात लिहितो :

'Until about fifteen years ago, our pineal was thought to be a useless vestigial appendage, something left over from reptilian times. Then in 1959, Aaron Lerner of Yale University discovered that it produced a harmone which is called melatonin, and the pineal changed its image from degenerate body to renascent gland. Interest in pineal revived and a year later it became clear that melatonin was manufactured from serotonin, a very strange substance that occurs in the most unlikely places. It is found in dates and bananas and plums, but now where it is more common than in a species of wild figs that grow in tropics into huge sprawling trees with hanging roots that prop their branches up in beautiful shady colonnades. In Africa these banyan trees are sacred to many people and are very seldom cut. In India they are known as bo, and it is said that it was beneath one of these trees that the prince Siddharth Gautma sat (eating the figs?) when he suddenly understood the causes of human suffering. It was this enlightenment that led to his being called the Buddha.'

सुमारे पंधरा वर्षांपूर्वीपर्यंत,आपली पीनियल ग्रंथी ही सरपटणाऱ्या प्राण्यांच्या काळातील एक निरुपयोगी अवशेष मानली जात होती.मग १९५९ मध्ये,येल विद्यापीठातील ॲरॉन लर्नर यांनी शोध लावला की ही ग्रंथी मेलाटोनिन नावाचा एक हार्मोन तयार करते,

आणि त्यामुळे पीनियल ग्रंथीची प्रतिमा एका क्षीण झालेल्या अवयवावरून बदलून एका पुनरुज्जीवित ग्रंथीमध्ये रूपांतरित झाली.पीनियल ग्रंथीबद्दलची उत्सुकता पुन्हा जागृत झाली आणि एका वर्षानंतर हे स्पष्ट झाले की मेलाटोनिन हे सेरोटोनिनपासून तयार होते,जो एक अत्यंत विचित्र पदार्थ आहे आणि तो अगदी अनपेक्षित ठिकाणी आढळतो.तो खजूर,केळी आणि आलुबुखार यांसारख्या फळांमध्ये आढळतो,पण तो उष्णकटिबंधीय प्रदेशात वाढणाऱ्या जंगली अंजिरांच्या एका प्रजातीपेक्षा अधिक सामान्य कुठे आहे हे सांगता येत नाही.ही झाडे प्रचंड पसरट होतात आणि त्यांची लोंबणारी मुळे त्यांच्या फांद्यांना सुंदर,सावलीच्या स्तंभांप्रमाणे आधार देतात.आफ्रिकेत ही वडाची झाडे अनेक लोकांसाठी पवित्र आहेत आणि ती क्वचितच तोडली जातात. भारतात त्यांना 'बो' या नावाने ओळखले जाते आणि असे म्हटले जाते की राजकुमार सिद्धार्थ गौतम याच झाडांपैकी एकाखाली बसले होते (अंजीर खात असताना?) तेव्हा त्यांना मानवी दुःखाची कारणे अचानक समजली.याच ज्ञानप्राप्तीमुळे त्यांना 'बुद्ध' म्हटले जाऊ लागले.(मुळ पुस्तकात फक्त इंग्रजी उतारा आहे.गुगल भाषांतर वापरुन त्याचा हा अनुवाद आहे.)

हिंदू लोक पिंपळाला विशेष पवित्र मानतात.वैदिक काळात पिंपळाच्या लाकडाच्या घर्षणानं अग्नी तयारी करीत.

बोधिद्रुम,चलदल,पिप्पल,कुञ्जाशन व अश्वत्थ असे पिंपळ वृक्षासाठी अमरकोशात पर्यायी शब्द दिले आहेत.

बोधिद्रुमश चलदलःपिप्पलःकुञ्जराशनः अश्वत्थे ॥

वरील शब्दांचं अनुकरण करून 

'अभिधान चिंतामणी' कोशात श्रीवृक्ष व कृष्णावास अशा पर्यायी शब्दांची नोंद केली आहे.पिंपळाची पानं हे.हत्तीचं अतिशय आवडतं खाद्य आहे.म्हणूनच पिंपळाला कुञ्जराशन म्हटलं आहे.हत्तींचं पालन करणाऱ्या हिंदूंनी मुसलमान अथवा परधर्मीय माहूत ठेवून हत्तींना पिंपळपानाचा चारा देण्याची समस्या सोडवली आहे। 

अश्वत्थ म्हणजे ज्याच्याकडं घोडे आहेत,अशा अर्थाचा पर्यायी शब्द आहे.हत्ती आणि घोडे हे प्राचीन काळात अमूल्य धन समजलं जाई.प्राण्यांचा उपयोग प्रवासासाठी,तसाच युद्धातही केला जाई.हत्तीचं आरोग्य चांगलं राहावं, म्हणून पिंपळपानाचा चारा देत,तर पिंपळ वृक्षाखाली हवा निरोगी राहाते,म्हणून घोडे बांधीत असत. 

विष्णुपुराणात पिंपळ वृक्षाचा मोठा मार्मिक उल्लेख आला आहे ज्याप्रमाणे विशाल पिंपळ वृक्ष एका सूक्ष्म बीजात सामावलेला असतो,त्याप्रमाणे संपूर्ण विश्व एका ब्रह्माच्या ठायी सामावलेलं आहे.

गुरुचरित्रात पिंपळ वृक्षाचा कल्पवृक्ष असा उल्लेख करून 

'कल्पवृक्ष असे अश्वत्थ। कल्पिले फळ त्वरित होय।'

असा त्याचा सविस्तर महिमा सांगितला आहे.

असा पिंपळ वृक्ष लोकसाहित्यात न आला तरच आश्चर्य, श्रीमती दुर्गाबाई भागवतांनी त्यांच्या 'लोकसाहित्याची रूपरेखा' या ग्रंथात सोन्याच्या पिंपळाविषयी सुंदर लोककथा दिली आहे :

'एका राजाला स्वप्नात सोन्याचं झाड दिसतं.त्याला रुप्याचं खोड असतं.सोन्याच्या फांद्या असतात. हिऱ्यामाणकांची फुलं आणि मोत्यांचे घोस असतात. - त्याच्या नावडत्या राणीचा मुलगा ते झाड प्रत्यक्षात शोधायला निघतो.तळ्याखालच्या राक्षसाच्या चार मुली सोनावंती,रूपावंती,हिरावंती,मोतावंती या नायकाला भेटतात.

राक्षसाला तो मारतो आणि मग त्या मुली स्वतःची शिरं त्या नायकाला तोडायला सांगतात.त्या चार मुलींचं मिळून ते झाड होतं.फिरून शिरं धडाला लावली, की झाड अदृश्य होतं व मुली परत जिवंत होतात.'

ही कथा 'सोन्याचा पिंपळ' म्हणून प्रसिद्ध आहे.

'मकुज्जिय कनसुगळु' (मुक्या आजीची स्वप्नं) ही डॉ. शिवराम कारंथांची ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त झालेली कादंबरी.या कादंबरीला कथानक नाही.कथानायक नाही,कथानायिका आहे.मुकज्जी म्हणजे मुकी आजी. तिचा बालपणीच विवाह झाला होता.ती लवकरच विधवा झाली.ऐन तारुण्यात तिच्या मनाला धक्का देणारी एक घटना घडते आणि तिच्या मनाचा तोल जातो.

लोकांना वाटतं,मुकज्जीला भूतबाधा झालेली आहे.अंगातून भूत काढून टाकण्यासाठी तिला खूप मारहाण करतात.मुकज्जीला असं वाटतं,की आपण बोललो,की मार बसणार!अनेक वर्षं ती कुणाशीही एक शब्दही बोलत नाही.तिचा बाहेरच्या जगाशी संपर्क तुटतो.ती स्वतःशीच चिंतन-मनन करू लागते.अस्वस्थ झालेलं मन शांत होतं.तिला जणू आत्मज्ञान होतं.हे आत्मज्ञान तिला घरासमोरच्या पिंपळ वृक्षाखाली होतं. या ऐंशी वर्षांच्या वृद्धेला अर्तीद्रिय शक्ती प्राप्त झालेली असते.तिचा पुतण्या मानववंशशास्त्रज्ञ आहे. 

मुकज्जीवर त्याची खूप श्रद्धा असते.तो साऱ्या जंगलात भटकंती करून ठिकठिकाणांहून मृत माणसांच्या कवट्या गोळा करून घरी आणतो.त्या कवट्यांची मोजमापं घेऊन तो संशोधन करीत असतो.

या संशोधनात मुकुज्जीचं फार मोठं साहाय्य होतं.प्रथम ती पिंपळ वृक्षाला स्पर्श करून नंतर कवटीला स्पर्श करते. हजारो वर्षांपूर्वी मृत झालेल्या व्यक्तीचा भूतकालीन इतिहास ती तिच्याजवळ असलेल्या अतींद्रिय ज्ञानाच्या साहाय्यानं सांगते.

मौनव्रत ही एक प्रकारची योगसिद्धी आहे. पिंपळस्पर्शानं तिला अतींद्रिय ज्ञान प्राप्त झालं आहे.पूर्वी प्रत्येक खेड्यात वडा-पिंपळाची झाडं लावीत. त्यांच्यापासून सावली तर मिळेच,परंतु त्या झाडांमुळं पिकांचं पाखरं आणि वानर-माकडं यांपासून होणारं नुकसान टळे.जेव्हा वड-पिंपळ फळांनी बहरून जातात, तेव्हा पाखरं,वानर-माकडं यांना त्यांचं भरपूर खाद्य मिळतं.

श्रीलंका येथील एका पिंपळ वृक्षाचं वय २१४७ वर्षांचं आहे असं म्हणतात.पिंपळाची झाडं लावणं आणि त्यांच्याभोवती पार बांधणं हे धार्मिक कृत्य समजलं जाई.रामदास स्वामींनी म्हटलं आहे:

'वृंदावने पार पिंपळा बांधी तो सत्त्वत्गुण।'

पाखरमाया,मारुती चितमपल्ली,साहित्य प्रसार,केंद्र, सीताबर्डी,नागपूर

पिंपळाच्या झाडाची उपयुक्तता,पर्यावरणाच्या दृष्टीनं त्याचं महत्त्व,धार्मिक भावनेतून पिंपळाला मिळणारं संरक्षण यांचा विचार करून टाटांनी त्यांच्या शिक्षण संस्था,कारखान्यांचे परिसर व लोणावळ्याजवळ शिरवते पक्षी अभयारण्यात पिंपळाची झाडं लावली आहेत. टाटांचं अनुकरण सर्व देशभरात झालं पाहिजे.

समाप्त..



6/29/26

संस्कृतीची बांधणी / The construction of culture

हजारी वर्षे शेतीप्रधान संस्कृतीत आपल्या आश्रयदात्यांसाठी काम करण्याची जी रूढी होती तिच्या ऐवजी संगीतकार,कलाकार,

रचनाकार आणि लेखक मोठ्या प्रमाणात बाजारपेठेत फेकले गेले.दिवसेंदिवस त्यांनी आपले उत्पादन अनामिक गिऱ्हाईकांना 'पेश करण्याचा धडाका लावला.हाच प्रकार दुसऱ्या लाटेच्या प्रभावाखालील सर्व देशांमध्ये घडल्यामुळे कलात्मक सर्जनतेची संपूर्ण धाटणीच बदलूम गेली.

संगीत हे याचे ठळक उदाहरण ठरेल.दुसरी लाट आल्यानंतर लंडन,व्हिएन्ना पॅरिस आणि इतर अनेक ठिकाणी जलशांसाठी मोठमोठे कॉन्सर्ट हॉल निर्माण झाले.त्यांच्याबरोबरच गल्ला पध्दतीचाही जन्म झाला. निर्मात्याला पैसे पुरवणारा उद्योगपतीही आला; संस्कृतीच्या ग्राहकांना तिकिटे विकणेही आले !

जो जास्त तिकिटे खपवेल त्याला सहाजिकच अधिक पैसा मिळू लागला.त्यामुळे जास्तीजास्त खुर्च्या असलेले अधिक मोठे हॉल बांधण्यात येऊ लागले. सर्वांत मागच्या रांगेतही संगीत ऐकू जावे या हेतूने मोठा ध्वनी आवश्यक ठरला.या सर्वांचा परिणाम म्हणजे संगीत,खोलीत मर्यादित न रहाता 'सिफोनिक्' झाले.

हिस्ट्री ऑफ म्युझिकल इन्स्ट्ररुमेंट्स या पुस्तकात करें साख्स (Sachs) याने म्हटले आहे,की 'अठराव्या शतकातील संगीत उमरावी संस्कृतीतून निघून लोकानुवर्ती झाल्यासळे दिवसे दिवस अधिक मोठे हॉल जलशांसाठी तयार झाले.त्यामुळे आवाज अधिक मोठा असण्याची आवश्यकता निर्माण झाली." त्याकाळी ही गोष्ट शक्य करण्यासाठी आवश्यक असणारे तंत्रज्ञान अवगत झालेले नव्हते, त्यामुळे आवश्यक तितका मोठा आवाज निर्माण करण्यासाठी अधिकाधिक वाद्ये आणि वादक यांची 'भरती' वाद्यवृंदात होऊ लागली.या सर्व गोष्टींचा परिपाक म्हणजे आधु‌निक सिंफनी ऑर्केस्ट्रा.आणि या औद्योगिक संस्थेसाठीच बीथोवेन,शूबर्ट,ब्राह्मस् इत्यादींनी अप्रतिम रचना निर्माण केल्या.वाद्यवृंदात देखील कारखाना आणि त्याची अंतर्गत रचना प्रतिंबिबित झाली होतीच.सुरुवातीला वाद्यवृंदाला कोणी नेता असत नव्हता.कधी कधी नेतेपण वादकांमध्येच एकाकडून दुसऱ्याकडे जात असे.परंतु नंतर कंडक्टर'च्या हाती सर्व सूत्रे गेली.निरनिराळ्या वाद्य विभागात वादकांची विभागणी (आणि स्थापना) झाली.

आणि एखाद्या कारखान्यातील कामगारांनी किंवा कचेरीतील नोकरांनी कामे करावीत त्यानुसार वादक वाद्यांवर कामे करू लागले;आणि आपला कामाचा वाटा एकूण निर्मितीला,संगीताला अर्पण करु लागले ! समाजग्राहकाला ही संस्था आपली निर्मिती विकू लागली;फोनोग्राफ रेकॉर्डस् विकल्या जाऊ लागल्या. आणि अशा तन्हेने संगीताचा कारखाना जन्माला आला.

दुसऱ्या लाटेच्या सामाजिक क्षेत्रात निर्माण झालेल्या जीवनपद्धतीचे,वाद्यवृदांचा इतिहाम हे केवळ एक उदाहरण झाले.तीन प्रमुख संस्थांनी,हजारो विविध संघटनांनी सर्वांनीच औद्योगिक तांत्रिक क्षेत्राच्या पद्धतीचा अंगीकार केला;कारण ती एक प्रमुख गरज होतो.परंतु संस्कृती म्हणजे केवळ तांत्रिक क्षेत्र नव्हे, किंवा त्याला अनुरुप असे सामाजिक क्षेत्रही नव्हे.सर्व संस्कृतीमध्ये उत्पादन आणि वितरणविषयक माहिती प्रस्तुत करण्यासाठी जाहिरात क्षेत्राची आवश्यकता असते.त्यात देखील दुसऱ्या लाटेने लक्षणीय असे बदल केले.

कागदी बर्फवादळ

प्राचीन काळापासून आजपर्यंत सर्व मानवी गट प्रत्यक्ष आणि व्यक्तिगत व अशा दळणवळणावर अवलंबून रहात आलेले आहेत.तरीदेखील दूर अंतरावर संदेश पाठविण्यासाठी काही व्यवस्था निर्माण होण्याची निकडही होतीच.प्राचीन पर्शियन लोकांनी ठिकठिकाणी, स्तंभ उभारलेले होते.या 'आरोळी स्तंभा' वर मोठे आणि कर्कश्य आवाज असणाऱ्या लोकांना ठेवण्यात येत असे.एका स्तंभावरील माणूस पुढच्या स्तंभावरील माणसाकडे ओरडून संदेश पाठवित असे.रोमन लोकांनी विस्तृत अशी संदेशवाहक यंत्रणा कार्यान्वित केलेली होती.या यंत्रणेचे नाव होते cursus publicus. इ. स. १३०५ ते १८ व्या शतकाच्या सुरुवातीच्या भागात संपूर्ण युरोपात हाऊस ऑफ टॅक्सीजचा प्रचार होता.ह्यात तट्टूंच्या सेवेचा भाग होता. इ.स. १६२८ च्या सुमारास २०,००० माणसे संदेश वाहक म्हणून कामावर होती.हे जासूद निळे जरतारी गणवेश धारण करून या खंडातील राजपुत्र,सेनापती,व्यापारी आणि सावकार यांच्या संदेशांची ने आण करीत संचरत असत.पहिली लाट-संस्कृती प्रभावशाली असताना या सर्व व्यवस्था फक्त श्रीमंत आणि बलशाली लोकांसाठी राखून ठेवलेल्या असतः सर्वसामान्य लोकांना इथे रिधाव नव्हता.लॉरिअन शिलिक्स या इतिहासात त्याने म्हटले आहे,की " इतर मार्गांनी ते पत्र पाठविण्याचे कोणी प्रयत्न केल्यास संशयाने त्याकडे पाहिले जात असे..आणि अधिकाऱ्यांकडून त्या गोष्टीला प्रतिबंध केला जात असे.थोडक्यात,समक्ष किंवा स्वतः माहितीची देवाण-घेवाण करणे हे सर्वांसाठी खुले होते. परंतु माहिती पाठविण्याचे किवा मिळविण्याचे नवे मार्ग कुटुंब किंवा खेडी यांच्या मर्यादपलीकडील तसे बंदिस्त आणि ठराविक आवाक्याचे होते.आणि त्यांचा वापर सामाजिक किंवा राजकीय हुकुमतीसाठीच होत होता. आणि पुष्कळदा श्रेष्ठ लोकांकडून त्यांचा वापर एखाद्या शस्त्राप्रमाणे होत असे.

दुसरी लाट जेव्हा देशादेशांतून पसरली,तेव्हा तिने संदेश वहनाच्या या मक्तेदारीचा चक्काचूर करून टाकला. श्रीमंत आणि बलशाली सत्ताधारी एकाएकी परहित दक्ष झाले,आणि त्यामुळे हे घडले असे मात्र नाही.झाले काय,की दुसऱ्या लाटेची तंत्राधिष्ठता आणि कारखान्यांतून होणारे प्रचंड उत्पादन या गोष्टीसाठी तितक्याच प्रचंड वेगात संदेशांची देवाण-घेवाण होणे जरुर होते.आणि या जुन्या पद्धतीनाही गरज पूर्ण करणे शक्यच नव्हते.

प्राचीन आणि पहिली लाट-संस्कृतीच्या समाजातील आर्थिक उत्पादन आणि या संदर्भातील दळणवळण तुलनेने साधे होते.आणि सहसा हाताशी असलेल्याकडून ते करून घेता येत असे.ते सहमा तोंडी किंवा हावभावांनी व्यक्त होणारे असे.या उलट दुसऱ्या लाटेच्या अर्थशास्त्राला अनेक ठिकाणी होणाऱ्या कामात अचूक सुसंवाद आवश्यकच होता.केवळ कच्चा मालच नव्हे, तर मोठ्या प्रमाणात माहिती तयार करुन तिचे काळजीपूर्वक वितरण होणे आवश्यकच होते.

ह्यासाठीच दुसरी लाट भरात येत असतानाच प्रत्येक देशाने अहमहमिकेने पोस्ट सेवा उभारली.

खरोखरच पोस्ट ऑफिस हा देखील सरकी दूर करण्याच्या किंवा सूत तयार करण्याच्या यंत्राइतकाच अपूर्व शोध होता आणि आज आपण विसरलो,पण एकेकाळी त्यानेही आनंद व उल्हास निर्माण केला होता.तो मात्र मात्र आता नाहीसा झाला आहे.अमेरिकन वक्ता एडवर्ड एव्हर्ट यांनी म्हटले आहे," मला हे मान्य करावे लागेल,की ख्रिस्ती धर्माखालोखाल, आपल्या आधुनिक संस्कृतीचा पोस्ट ऑफिस हा उजवा हात आहे.'पोस्ट ऑफिसने औद्योगिक युगाच्या दळणवळणाला खूप मोठे क्षेत्र खुले करुन दिले.इ.स.१८३७ च्या सुमाराला ब्रिटिश पोस्ट ऑफिस केवळ श्रेष्ठीचे संदेशवहनच करत नव्हते,तर दरसाल सुमारे ८८ दशलक्ष वस्तूंची वाहतूक करीत होते.त्या काळाच्या मानाने हा वाहतुकीचा अक्षरशः

भडिमारच नव्हे काय? इ.स. १९६० च्या सुमाराला,म्हणजे जेव्हा ओद्योगिक युगाने कळस गाठला होता आणि तिसरी लाट उसळू लागली होती, अशा वेळी हाच आकडा १० महापद्म पर्यंत जाऊन पोचला होता.याच वर्षी अमेरिकेतील पोस्ट खात्याने देशातील प्रत्येक पुरुष,स्त्री व मूल यांना सरासरी ३५५ घरगुती वस्तू पोचवल्या !

दुसऱ्या लाटेच्या संदर्भात,औद्योगिक क्रांतीसह आलेले हे पोस्ट संदेशवहनाचे उधाण,ही तेव्हा होत असलेल्या संदेशवहनाची एक चुणुक म्हणावी लागेल.मोठ्या संस्थांमध्ये यापेक्षाही कितीतरी अधिक प्रमाणात संदेश 'मायक्रो-पोस्टल सिस्टिम्स' द्वारा दिले-घेतले जात होते. मेमो म्हणज सार्वजनिक दळणवळणात कधीही न जाणारी पत्रे होत.इ. स. १९५५ मध्ये,अमेरिकेत,दुसरी लाट उत्तुंग झालेली असताना,तीन मोठ्या कॉर्पोशन्सच्या दप्तरात हूवर कमिशन डोकावत होते तेव्हा त्याला असे आढळून आले,की या तीन कॉर्पोशन्समध्ये अनुक्रमे ३४,०००,५६,०००, व ६४,००० दस्तऐवज व मेमो नोकरीवर असलेल्या प्रत्येकासाठी दप्तरबद्ध होते !औद्योगिक समाजाच्या वाढत्या संदेशवहनविषयक गरजा लेखी स्वरूपात भागवल्या जात होत्या असे नाही.

यामुळे टेलिफोन व तारांचे शोध १९ व्या शतकात वाढत्या संदेशवहन संदर्भातला आपापला भार त्यांनी उचलावा म्हणून लावण्यात आले. इ. स. १९६० च्या सुमाराला अमेरिकन माणसे दररोज २५६ दशलक्ष टेलिफोन कॉल्स करीत होती अतिशय प्रगत अशा टेलिफोन संस्था व त्यांचे जगातले जाळे नेहमीच अतिभारित होत राहिले

ह्या सर्व पद्धती मुख्यतः एक संदेश प्रेषक व तो घेणारा एक संदेश ग्राहक यांच्यासाठी होत्या.परंतु ज्या समाजात प्रचंड उत्पादन होत होते आणि उत्पादित वस्तु प्रचंड प्रमाणात वापरल्या जात होत्या,तिथे संदेशवहनही गठ्याने होणे आवश्यक होते. शिवाय एका संदेश प्रेषकाने दिलेला संदेश एकाच वेळी अनेक ग्राहकांना मिळणे ही गोष्टही आवश्यक झाली.ओद्योगिकपूर्व समाजातील मालक त्याच्या मोजक्याच नोकरांना व्यक्तिशःगरज पडल्यास त्यांच्या घरी जाऊनही,भेटू शकत होता.परंतु औद्योगिक मालकाला त्याच्या हजारो नोकरांच्या संदर्भात ही गोष्ट शक्यच नव्हती;

तो एकेकट्याला भेटू शकत नव्हता.मोठा व्यापारी, किंवा वितरक याला एकेका ग्राहकाशी संबंध ठेवणे हे त्याहूनही अशक्य होते.आणि म्हणून दुसऱ्या लाटेने एकच संदेश एकाच वेळी अनेक लोकांना,कमी खर्चात, आणि विश्वसनीयरीत्या पोचविण्याचे प्रभावी मार्ग शोधले.

पोस्ट सेवा एकच संदेश लाखो जणापर्यन्त पोचवू शकत होती.परंतु अपेक्षित वेगाने नाही.टेलिफोन द्वारे संदेश वेगाने पोचवता येत होते.परंतु त्याद्वारे एकाच वेळी लाखो लोकांना संदेश पोचविता येत नव्हते.ही त्रुटी वृत्तमाध्यमानी भरुन काढली.

अर्थात आजमितीला औद्योगिक राष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात वर्तमानपत्रे हा आवश्यक भाग होऊन गेलेला आहे.मोठ्या प्रमाणात त्यांची प्रसिध्दी आणि विक्री होत असते.परंतु राष्ट्रीय पातळीवर या प्रकाशनांची जी उन्नती झाली,त्यात अनेक नव्या औद्योगिक तंत्रांच्या एकाच दिशेने झालेल्या घडणींचे आणि समाज रचनांचे प्रतिबिंब आढळते.

युरोपाच्या आकाराच्या एखाद्या संपूर्ण देशात एका दिवसात प्रकाशने पोचावीत या उद्देशाने आगगाड्यांचा उपयोग करुन घेण्यात आला.काही तासांच्या अवधीत, कोट्यवधी प्रती छापणारे रोटरी छापखाने आले. टेलिफोन आणि तारांचे जाळे उभे राहिले,शिक्षण सक्तीचे झाले आणि त्याद्वारे लोकांना साक्षर करण्यात आले.उद्योगाला आपले उत्पादन जनतेपर्यंत पोचण्याची आवश्यकता होती.

वृत्तमाध्यमातही आपल्याला पुनाःकारखाना तत्त्वाचा अनुभव येतो.वृत्तपत्रे, रेडिओ, सिनेमा, टेलिव्हिजन यांच्या पसाऱ्यातही तत्त्व तेच.कारखान्याचे.लाखो मेंदूवर ह्या सर्व गोष्टी एकाच प्रकारचे संदेश ठसवत रहातात. कारखान्यात उत्पन्न झालेल्या,लाखो घरात वापरल्या जाणाऱ्या एकसारख्या वस्तूंवर नाही का शिक्के किंवा ठसे उमटवण्यात येत ? प्रमाणीभूत,प्रचंड प्रमाणात निर्माण झालेल्या वस्तू ज्यांची प्रतिमा निर्माण झाली आहे अशा काही केंद्रीभूत कारखान्यातून निर्माण होतात,आणि लाखो ग्राहकांकडे त्यांचा ओघ वहात रहातो. अशा विस्तृत, शक्तिशाली जाहिरात माध्यमाच्या मदतीखेरीज औद्योगिक संस्कृतीने आकार घेणे अगर ती विश्वसनीयरीत्या कार्यान्वित होणे शक्य नव्हते.

सर्व भांडवलशाही आणि त्याचप्रमाणे समाजवादी समाजातून यानुसार एक गुंतागुंतीचे माहिती क्षेत्र उत्तरले;त्याच्याद्वारां वैयक्तिक आणि सामूहिक संदेशाचे वितरण तयार वस्तूंप्रमाणे किवा कच्च्या मालाप्रमाणे अतिशय कार्यक्षमतेने केले जात असे.हे जाहिरात क्षेत्र तांत्रिक क्षेत्राच्या आणि सामाजिक क्षेत्राच्या बरोबर जणू विणले गेले होते आणि कार्य करत होते;त्याद्वारे त्याने आर्थिक उत्पादन आणि खाजगी वर्तणूक यांच्यात एकतानता आणि एकसूत्रता आणली.या क्षेत्रांनी मोठ्या क्षेत्रात फार महत्त्वाच्या भूमिका बजावल्या.लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे ही क्षेत्रे आपल्या एकट्याच्या बळावर इतरांशिवाय अस्तित्वात येऊच शकली नसती.तांत्रिक क्षेत्राने उत्पादन केले आणि संपत्ती तयार ठेवली;सामाजिक क्षेत्राने एकमेकांशी संबंधित अशा हजारो संस्थांसह कार्य करीत प्रत्येक व्यक्तिला विहित कार्य दिले.आणि माहिती क्षेत्राने,एकूण प्रणाली कार्यान्वित रहाण्याच्या दृष्टीने नेहमीच माहिती तयार ठेवली.

एकूण,समाजाची मूलभूत बांधणी त्यांनी केली.

थोडक्यात आपल्याला असे आढळून येईल,की दुसऱ्या लाटेखालील देश मुळात कोणत्याही संस्कृतीचे किवा भौगोलिक परिस्थितीतले असले,तरी आणि कोणत्याही मानववंशाचे,धर्माचे असले,तरी समाजवादी असले तरी, वा भांडवलशाही असले तरी त्यांची नवीन बांधणी एकाच धर्तीवर झालेली होती.

ह्या समान रचनांनी रशिया,हंगेरी,पश्चिम जर्मनी,फ्रान्स, कॅनडा- किंवा दुसरा कोणताही दुसऱ्या लाटेखालील देश- या देशात विशिष्ट मर्यादा तयार केल्या,आणि त्या मर्यादा सांभाळतच त्यांच्या राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक भिन्नता प्रकट झाल्या.

प्रत्येक ठिकाणी जुन्या लाटेच्या रक्षणाचे प्रयत्न करणाऱ्यांत आणि नव्या लाटेद्वारां जुने बिकट आणि क्लेशकारक प्रश्न सोडवले जाणार असल्याचे ओळखणाऱ्यांत राजकीय,सामाजिक,आणि आर्थिक झगडे होऊन गेल्यानंतरच त्या समाजरचना उद्भवल्या.

दुसन्या लाटेने आपल्या आगमनाबरोबर मानवी आशा विस्तारल्या.कारण यावेळीच पहिल्यांदा स्त्री पुरुषांना हे ओळखण्याचे धैयं झाले,की दैन्य,भूक,रोगराई आणि अन्याय या उलथून टाकण्याच्या गोष्टी आहेत. आदर्शवादी कल्पनारम्य जगात रमलेल्या कित्येक लेखकांना आणि तत्त्वचितकांना उभरणाऱ्या औद्योगिक संस्कृतीत शांती,एकोपा,सर्वांसाठी नोकरी,संधीची समानता,

जन्मानुसारच्या ज्येष्ठताक्रमाचा शेवट,आणि अक्षरक्ष: हजारो वर्षे शेतीप्रधान संस्कृतीच्या काळात अस्तित्वात असलेल्या व कधीच बदलणार नाहीत आणि शिवाय अमरच आहेत असे दिसणाऱ्या सर्व कष्टप्रद अवस्थांचा शेवटः इतक्या गोष्टी अंतर्भूत असलेल्या दिसल्या ! आज आपल्याला औद्योगिक संस्कृती तितकीशी आदर्शभूत वाटत नाही.असे वाटते,की ती काहीशी दडपशाही वृत्तीची आहे,भयाण आहे.प्राकृतिक दृष्ट्या विभिन्न असणाऱ्या निरनिराळ्या मानवगटांच्या संबंधांबाबत धोकादायक आणि अस्थिर आहे,लढाया करण्यासाठी टपूनच बसलेली आहे,आणि मानसिक दृष्ट्या दडपलेली अशी आहे.परंतु ती तशी का आहे हे आपल्याला समजणे आवश्यक आहे.ही गोष्ट कळण्यासाठी,ह्या प्रश्नाचे उत्तर मिळवण्यासाठी आपल्याला एका प्रचंड विभाजक तत्त्वाकडे लक्ष द्यावयास हवे.या विभाजक तत्त्वाने पाचरीप्रमाणे कठोर चंचुप्रवेश करुन दुसऱ्या लाटेच्या आत्म्याचे दोन प्रतिस्पर्धी तुकडे केलेले आहेत.

संस्कृतीची बांधणी / The construction of culture

हा तीन विभागात प्रकाशित झालेला लेख संपला.तो २४,२६,२८.या तारखांना क्रमशः प्रकाशित झालेला आहे.आपले धन्यवाद व आभार...



6/26/26

संस्कृतीची बांधणी / The construction of culture

दुसऱ्या लाटेच्या संस्कृतीला विशिष्ट मुखवटा देणाऱ्या, तांत्रिक पायावर उभारलेल्या अशा कित्येक कारखान्यांचा उद्भव झाला.कोळसा उद्योग,गिरण्या, लोहमार्ग,

पोलाद,स्वयंचलित यंत्र व वाहने यांची निर्मिती, अ‍ॅल्युमिनियम,रसायने,उपकरणे यांच्या कारखान्यांची उभारणी,त्याबरोबरच मोठ्या औद्योगिक शहरांचाही जन्म झाला उदा.गिरण्यांसाठी मॅचेस्टर,मोटारीसाठी डेट्रॉइट.अशी शेकडो उदाहरणे आहेत.आणि या औद्योगिक केंद्रातून एकसारख्या अशा लाखो उत्पादित वस्तूंचा वर्षाव सुरु झाला ! उदा- शर्ट,बूट,वाहने,घड्याळे,खेळणी ,साबण,शांपू,

कॅमेरा,मशिन गन्स व चलन यंत्रे (मोटर्स) नव्या इंधन पद्धतीचा आधार मिळालेल्या नव्या तंत्रज्ञानाने अतिशय मोठ्या प्रमाणात होणाऱ्या उत्पादनाचे द्वार खुले केले.

व्हर्मिल्यन पॅगोडा

तथापि ह्या ढीगभर उत्पादनाला जर वितरणपद्धतीत योग्यवेळी केल्या गेलेल्या योग्य त्या बदलाची साथ मिळाली नसती तर व्यर्थ ठरले असते.पहिली लाट-संस्कृती अस्तित्वात असताना वस्तु हस्तकला पद्धतीने गि-हाइकांच्या आश्रयानुसार उत्पादन केली जात असे.वितरणाची पद्धतही त्यानुसारच होती.

आता ही गोष्ट खरी आहे,की पश्चिमेकडे मोठ्या आणि त्या त्या काळी आधुनिक ठरतील अशा व्यापारी संस्था, जुन्या सरंजामी व्यवस्थांमधील फटी रुंदावत, व्यापा-यांनी उभारलेल्या होत्या.या संस्थांनी जगभर नवे व्यापारी मार्ग सुरु केले,जहाजांच्या काफिल्यांची रचना व व्यवस्था केली,व उंटांच्या तांड्यांचीही योजना केली. त्यांनी काचेच्या वस्तु,कागद,रेशीम,चहा,जायफळे,दारु, लोकर,नीळ,जायपत्री अशा वस्तूंचा वापर केला.

तथापि यातील बहुतेक सर्व वस्तू ग्राहकांना छोट्या दुकानातून किंवा खेडोपाडी भटकत जाणाऱ्या फिरस्त्या व्यापाऱ्याच्या पेटाऱ्यातून मिळत असत.दळणवळण अगदीच 'दरिद्री' होते;आणि दळणवळणाचे मार्ग अगदी प्राचीन व रद्दी होते.

त्यामुळे वस्तूंच्या व्यापारावर खूपच मर्यादा पडल्या होत्या.हे छोटे दुकानदार आणि फिरते फेरीवाले ग्राहकांना हव्या असलेल्या वस्तूंपैकी फारच थोड्या वस्तु पुरवू शकत होते.आणि पुष्कळ वेळा असे व्हावयाचे की ही किंवा ती वस्तू ग्राहकाला हवी असताना देखील महिनोगणती, वर्षानुवर्षे देखील या विक्रेत्यांनाच उपलब्ध झालेली नसायची !

दुसऱ्या लाटेने या ओझ्याने वाकलेल्या,करकरणाऱ्या वितरणपद्धतीत एका अर्थी आमूलाग्र ठरतील असे बदल,उत्पादनात अधिक प्रसिद्ध सुधारणा होत असताना घडवून आणले.लोहमार्ग,हमरस्ते,कालवे ज्या त्या पार्श्वभूमीनुसार तयार करण्यात आले.'व्यापाराचे प्रासाद' औद्योगिकीकरणासहित अस्तित्वात आले-पहिली डिपार्टमेंटल स्टोअर्स ! शेअर दलाल, घाऊक व्यापारी,कमिशन एजंट, उत्पादकांचे प्रतिनिधी यांची अक्षरश जाळी तयार झाली. इ. स. १८७१ मध्ये जॉर्ज हंर्टिग्टन हर्टफोर्ड याचे असले पहिले दुकान न्यूयॉर्कमध्ये उघडले.हे दुकान व्हर्र्मिलन लाल भडक रंगात रंगवलेले होते आणि याच्या रोख पैसे देण्याघेण्याचे व्यवहार करणाऱ्या कारकूनाचा कॅशियरचा पिजरा एखाद्या चिनी पॅगोडाच्या आकाराचा होता ह्या हर्टफोर्डनंतर हेन्री फोर्ड याने आपल्या कारखान्याच्या मालाच्या वितरणासाठी जे करणे शक्य होते ते सर्व केले ! त्याने या दुकानाची भरभराट करून त्याला अशा स्थितीत आणले,की ते जगातील पहिले साखळी पद्धतीचे विशाल दुकान ठरले.दि ग्रेट अटलांटिक अ‍ँड पँसिफिक टी कंपनी. 

ह्या प्रकारच्या वितरणाने व्यापार देखील इतक्या मोठ्या प्रमाणात चालला आणि वाढला,की तो यंत्रांप्रमाणेच औद्योगिक समाजाचे केंद्र बनला आणि सुपरिचित होऊन राहिला.

ज्याला आपण तंत्रज्ञानाचे क्षेत्र म्हणतो,त्याच्यात संपूर्ण परिवर्तन ह्या बदलांनी घडवून आणले.समाज मागास आदिवासी असोत की शेतीप्रधान असोत की उद्योगप्रधान असोत,ते ऊर्जा वापरतातच;

वस्तूंची निर्मिती करतात आणि त्यांचे वितरणही करतात.सर्व समाजात ऊर्जा संस्था,उत्पादन संस्था आणि वितरण संस्था ह्या खुद्द त्यांच्याहून काही तरी मोठ्या अशा संकल्पनेचे,एकमेकींशी संबंधित असलेले विभाग असतात.ही त्यांच्याहून मोठी असलेली संस्था म्हणजे समाजाच्या प्रगतीच्या प्रत्येक टप्प्यावर विशिष्ट स्वरुप धारण करत रहाणारे तंत्रज्ञान क्षेत्र होय.

जसजशी दुसरी लाट जगभर पसरत गेली,तसतसे शेतीविषयक तांत्रिक क्षेत्र बाजूला सरत गेले आणि त्याची जागा औद्योगिक तांत्रिक क्षेत्राने घेतली;पुन्हा भरून न येणाऱ्या प्रकारातील ऊर्जा फार मोठ्या प्रमाणावरील उत्पादनाला थेट जोडल्या,आणि त्या जागी,अतिशय प्रगत अशा मोठ्या वितरण व्यवस्थेत वस्तूंचा जणू वर्षांव केला गेला.

अत्याधुनिक कुटुंब

ह्या,दुसन्या लाटेच्या तंत्रविज्ञान क्षेत्राला सामावून घ्यावयाला तितक्या क्रांतीकारक सामाजिक क्षेत्राची आवश्यकता होती;आमूलाग्र नवीन असणाऱ्या समाज संस्थेची आवश्यकता होती.याबाबत उदाहरण देऊन बोलावयाचे म्हटल्यास, औद्योगिक क्रांतीपूर्वी कुटुंबरचना ठिकठिकाणी वेगवेगळया पद्धतीची होती.परंतु शेतीने वर्चस्व राखलेले असल्याने,लोकांचा कल मोठ्या थोरल्या,अनेक पिढ्यांना एकत्र सामावून घेणाऱ्या घरात रहाण्याचा होता.या घरात काका असायचे,काक्या असायच्या,सासू सासरे असायचे,आजी आजोबा,चुलत मालत भावंडे असायची.सगळी एका छपराखाली एकवटलेली असायची.आर्थिक उत्पादन करणाऱ्या एखाद्या गटाप्रमाणे सर्वजण एकत्र काम करीत असत.

या प्रकारात हिंदुस्थानातील एकत्र कुटुंब,बाल्कन्स मधील जाद्रुगा' आणि पश्चिम युरोपातील 'विस्तृत कुटुंब' यांचा समावेश करता येईल.कुटुंब जणू काही जमिनीत पुरल्याप्रमाणे अचल होऊन राही.

ज्यावेळी पहिल्या लाटेला ओलांडत दुसरी लाट पुढेपुढे पसरत निघाली होती.त्यावेळी विविध समाज,कुटुंबे यांच्यावर बदलाचा ताण पडला.प्रत्येक कुटुंबात दोन लाटांच्या पाठीराख्यांचे झगडे उठत राहिले;पितृसत्ताक अधिकार रचनेवरही आघात झाले,मुले व त्यांचे मातापिता यांचे संबंध बदलले.मालमत्तेबद्दलच्या नव्या कल्पना उदयाला आल्या.जेव्हा आर्थिक उत्पादन शेतीकडून कारखान्याकडे गेले,तेव्हा कुटुंबातील सर्वांनी एकत्र,एखाद्या उत्पादक गटाप्रमाणे,काम करणे सोडून दिले.कामे करणाऱ्यांना कारखान्यात काम करण्यासाठी मोकळे रहाता यावे म्हणून कुटुंबाची प्रमुख कामे नव्या तज्ञ संस्थांकडे सोपवण्यात आली.मुलांचे शिक्षण शाळांकडे सोपवण्यात आले.वृद्धांची काळजी घेण्याचे काम आश्रयगृहांवर किंवा शुश्रूषागृहांवर सोपविण्यात आले या सर्वांपेक्षा विशेष गोष्ट म्हणजे नव्या समाजाला इकडून तिकडे हालण्याची आवश्यकता होती त्यासाठी जे आपल्या उद्योगानुसार एक जागा सोडून दुसरीकडे जायला तयार होतील असेच कामगार हवे होते.

वयस्कर नातेवाईकांच्या मुळे,आजाऱ्यांमुळे,अपंगांमुळे आणि पुष्कळ मोठ्या प्रमाणात मुलेबाळे असल्यामु‌ळे व एकूण सर्व जबाबदाऱ्यांमुळे विस्तृत कुटुंबाने जागा सोडणे अशक्यच होते,म्हणून हळूहळू परंतु दुःख सावरत कुटुंबाची रचना बदलायला सुरुवात झाली. शहरांमध्ये जाऊन रहावे लागल्यामुळे,फाटाफूट होऊन, आर्थिक वादळांनी उध्वस्त होऊन,कुटुंबांनी नको असणाऱ्या नातेवाइकांना दूर करून छोटा आकार घेतला.नव्या तांत्रिक क्षेत्राला सुयोग्य ठरतील अशा त-हेने त्यांची रचना झाली.आणि ती हलती रहाण्यास बदलीला अधिक सोयीची ठरली.आई,बाप आणि त्यांचीच व तीही थोडीच मुले याशिवाय इतर कोणत्याही जवळच्या वा लांबच्या नातेवाईकांचा ज्यात समावेश नाही;अशी केंद्र कुटुंबपद्धती रुढ झाली आणि समाजानेही तिला मान्यता दिली.समाजवादी असो की भांडवलशाही असो,सर्व उद्योगप्रधान समाजात आढळणारा हा कुटुंबाचा 'आधुनिक' नमुना ! जेथे आपल्या पूर्वजांची पूजा होत असल्याने वडिलधाऱ्यांना अगदी अपवादात्मक ठरावी अशी महत्त्वपूर्ण भूमिका दिली जाई;मोठी,अगदी जिव्हाळ्याने एकत्र रहाणारी, अनेक पिढ्यांचा अगत्याने समावेश होई,अशी जपानमधील कुटुंबे देखील दुसरी लाट आल्यावर मोडून जाऊ लागली.आणि दिवसेदिवस अधिकाधिक केंद्र-कुटुंबे अस्तित्वात येऊ लागली.

थोडक्यात,दुसऱ्या लाटेच्या समाजांची अशी न्यूक्लिअर,एकेरी कुटुंबे, व्यवच्छेदक लक्षण बनून राहिली.त्यामुळे पहिल्या लाटेच्या समाजाहून तीही भूगर्भ इंधने,पोलाद गिरण्या, किंवा साखळी दुकाने यांच्या प्रमाणेच तिच्या भिन्नतेमुळे वेगळी उठून दिसू लागली.

प्रच्छन्न अभ्यासक्रम

जसजशी कामाची जागा शेत व घर सोडून कारखान्यात एकवटली,तसतसे मुलांनी कारखान्यातील जीवनासाठी सज्ज होणे आवश्यक झाले.

अ‍ॅण्ड्रयू उर याने इ. स. १८३५ मध्ये म्हटल्याप्रमाणे सुरुवातीच्या खाणी,गिरण्या व कारखाने यांच्या मालकांना असे आढळून आले,की "ज्यांनी आपल्या वयाची कोवळीक ओलांडली आहे अशा माणसांना मग ती ग्रामीण जीवनातून आलेली असोत,की हस्तोद्योगाच्या व्यवसायातून आलेली असोत कुशल कारखाना कामगार म्हणून तयार करणे जवळजवळ अशक्यच होते." तरुण वयातच औद्योगिक जीवनपद्धतीनुसार व्यक्तींची घडण घडलेली असेल,तर औद्योगिक शिस्तींचे नंतर निर्माण होणारे प्रश्न अगदी सुलभतेने सुटतील. अशा विचारांतून दुसरी लाट संस्कृतीचे दुसरे एक महत्त्वपूर्ण अंग जन्माला आले-सामुदायिक शिक्षण.कारखान्यांच्या धर्तीवर सामुदायिक शिक्षण योजना पायाभूत वाचन,लेखन,अंकगणित,थोडा इतिहास आणि इतर विषयांचे ज्ञात देऊ लागल्या.हा उघड दिसू शकणारा अभ्यासक्रम होय.परंतु याच्याही मागे याहूनही खूपच अधिक पायाभूत असणारा प्रच्छत किवा अदृश्य अभ्यासक्रम अस्तित्वात होता.पूर्वी आणि आताही बहुतेक सर्व औद्योगिक देशांमध्ये अस्तित्वात असलेल्या या अभ्यासक्रमात तीन क्रम आवश्यकतेने अंतर्भूत असतात.एक म्हणजे वक्तशीरपणा,दुसरी गोष्ट म्हणजे आज्ञाधारकपणा आणि तिसरी गोष्ट पाठांतर किंवा एखादी गोष्ट पुनः पुन्हा करणे कारखान्यातल्या कामात कामगारांनी विशेषतः प्रत्यक्ष यंत्रचालकांनी वेळेवर हजर होणे ही आवश्यक गोष्ट होती.आणि कामगारांनी,

आपल्या वरिष्ठांकडून आज्ञा घेणे आणि कसलाही प्रश्न किवा विचार न करता त्या अंमलात आणीत काम करीत रहाणे आवश्यक होते.कामगार पुरुष असोत की स्त्रिया,त्यांनी यंत्रांशी किवा कचेरीत तेच तेच काम करीत रहाणे व त्यायोगे यंत्रवत् आचरण करणे ही गोष्ठ अपरिहार्य अशी ठरली.

याप्रमाणे एकोणीसाव्या शतकाचे मध्यंतर उलटल्यावर, दुसरी लाट वेगाने देशोदेशी जाऊन तिने तेथील कब्जा घेतल्यानंतर,शिक्षणाचा एकप्रकारे निष्ठुर क्रम अंमलात येऊ लागला.मुले लहान लहान वयातच शाळेत जाऊ लागली.अभ्यासाची वर्ष वाढली,आणि दिवसेदिवस शिक्षणाचा कालावधी मोठा मोठा होऊ लागला.

सार्वजनिक शिक्षण ही सुसंस्कृत होण्याच्या प्रगतीतली प्रमुख पायरी ठरली.न्यूयॉर्क शहरातील तंत्रकुशल व कामगार यांच्या एका गटाने इ. स. १८२९ मध्ये असे जाहीरपणे म्हटले की,"जीवन आणि स्वातंत्र्य यांच्या खालोखाल शिक्षण हे मानवी जीवनाला मिळालेले सर्वात मोठे वरदान आहे,असे आम्ही मानतो." तरीही आपण असे म्हणू शकतो की या दुसऱ्या लाटेतील शाळांनी पिडीमागून पिढी यंत्रवत् केली आणि यंत्रतंत्र ज्ञानाला योग्य असे आणि यंत्राशी यंत्रवत् आचरण करू शकणारे असे सहज वळवता येईल असे,पण कडक शिस्त आचरणारे असे कामगार दल तयार केले.एकूण औद्योगिक समाजाला योग्य असे तरुण तयार करण्याच्या दृष्टीने जी एकसूत्री पद्धत तयार झाली,तिचे न्युक्लीअर कुटुंबे आणि कारखाना पद्धतीचे शिक्षण हे प्रमुख भाग ठरले.या बाबतीत ही दुसरी लाट समाज, मग ते कोणत्याही देशातील असोत,एक सारखे ठरले.

अमर अस्तित्व

दुसऱ्या लादेतील या समाजांमध्ये पहिल्या दोन्हींवर सामाजिक ताबा ठेवू टाकणारी तिसरी संस्था उदयाला आली ती संस्था म्हणजे संघटित संस्था कॉरिशन ह्या काळापर्यंत उद्योग क्षेत्रातील ही विशिष्ट योजना व्यक्ती किंवा कुटुंब किंवा भागीदार यांच्या मालकीची असायची, कॉर्पोरेशन्स होत्या,परंतु त्या क्वचित् कुठेतरी अशा होत्या.औद्योगिक इतिहासाचे अभ्यासक ऑर्थर ज्युडंग यांच्या मते अमेरिकन क्रांतीपर्यंत कोणालाच असे वाटले नव्हते,की भागीदारी किंवा वैयक्तिक मालकी यांच्या ऐवजी प्रशासक अशी प्रमुख संघटना कधी अस्तित्वात येईल.

मोठया प्रमाणात उत्पादन सुरू झाल्यानंतर सर्व बदलले. दुसऱ्या लाटेतील तंत्रज्ञानाचा एखादी व्यक्ती किंवा एखादा छोटा गट पुरवू शकेल यापेक्षा कितीतरी अधिक भांडवलाची-भांडवलाच्या प्रचंड साठ्याची आवश्यकता होती.प्रत्येक वेळी भांडवल गुंतवताना हे मालक किवा भागीदार आपले सर्वस्व पणाला लावीत,परंतु अतिविशाल आणि अनिश्चित भविष्याच्या योजनांमध्ये पैसे गुंतवायला ते का कू करत असत.त्यांना याबाबतीत प्रोत्साहित करण्यासाठी लिमिटेड कंपन्यांची कल्पना पुढे आली.त्या योजनेनुसार जर संस्था कोसळली,तर ज्यांनी त्यांनी गुंतवलेली रक्कमच तेवढी बुडायची. अधिक धोका नव्हता.या नवीन संशोधित कल्पनेमुळे गुंतवणूक अक्षरशः लोंढा फुटून होऊ लागली.

शिवाय कोर्टानी कॉर्पोरेशन हे 'अमर' किंवा चिरंतन अशा प्रकारचे अस्तित्व असल्याचे गृहीत धरल्यानेही असा स्पष्ट अर्थ झाला,की मूळ संस्थापक घटकांपैकी कोणीही गळाले,तरी मूळ संस्था चालूच रहाणार, त्यामुळे एक झाले,की अशी संघटित संस्था अधिक कालावधींच्या,मोठ्या पल्ल्याच्या योजना आखू शकत होती आणि पूर्वी कधी घेतले गेले नसतील इतके प्रचंड मोठे काम हाती घेऊ शकत होती.

कॉर्पोरेशन हा सर्व उद्योगप्रधान देशांच्या आर्थिक जीवनातील अंगभूत भाग बनून राहिला देश समाजवादी असो की.भांडवलशाही तेथे कॉर्पोरेशन्स फार तर बाह्य स्वरुपात थोड्या फार भिन्न असतील,पण मूळ संघटन कल्पना सर्वत्र एकच होती.

दुसऱ्या लाटेचा अंगिकार करणाऱ्या समाजातील सामाजिक संस्थांत न्युक्लिअर कुटुंबे,कारखानावत् शाळा आणि प्रचंड कॉर्पोरेशन्स ह्या तीन गोष्टी प्रमुख लक्षणे ठरून गेल्या.

दुसऱ्या लाटेने व्यापलेल्या संपूर्ण जगात जपान, स्वित्झर्लंड,ब्रिटन,पोलंड,अमेरिका,रशिया- बहुतांश देशांतील लोकांनी एका ठराविक जीवनमार्गाचा अवलंव केला.त्यांची कुटुंबे अतिकेंद्रित झाली,कारखानावत् शाळा चालवून शिक्षण प्रशिक्षण यांचा मोठ्या प्रमाणात स्वीकार केला,आणि खाजगी असोत की,सार्वजनिक स्वरुपाच्या असोत,मोठ्या कॉर्पोरेशन्समधील नोकऱ्यांचा स्वीकार केला.आणि संपूर्ण जीवनावर या दुसरी लाट जीवनपद्धतीचा पगडा बसला.

संगीताचा कारखाना

आणि जीवनपध्दतीच्या याच गाभ्याभोवती इतर अनेक संघटना उद्भवल्या.सरकारी मंत्रिमंडळे,क्रीडा संघ,चर्च, व्यापारी संस्था,ट्रेड यूनियन्स,व्यावसायिक संस्था, राजकीय पक्ष,वाचनालये,मनोरंजन करणारे गट,मानव वंशासंबंधीच्या संस्था अशा हजारो संस्था दुसऱ्या लाटेच्या आवेगाबरोबर अस्तित्वात आल्या.आणि यातून असे गुंतागुंतीचे रचनात्मक संबंध निर्माण झाले,की यातला प्रत्येक गठ एकमेकांशी सेवेच्या,सहकार्याच्या एकमेकांच्या तोलाच्या संदर्भात एकमेकांशी संबंधित बनून राहिला.परस्परावलंबन,काही अंशी तरी,निर्माण झाले.वरवर पहाता हे विविध प्रकारचे गट किंवा या संघटना गोंधळ आणि निरूद्देश्यता प्रकट करतात.परंतु नीट पाहिले असताना आपल्याला त्यात एक धाटणी किंवा सुसूत्रता आढळून येते.दुसऱ्या लाटेखाली आलेल्या देशांत समाजसंशोधकांना कारखाने हा सर्वात प्रगत आणि कार्यक्षम प्रतिनिधी वाटला.त्यामुळे कारखान्याच्या कार्यप्रणालीत महत्त्वाची ठरणारी तत्त्वे त्यांनी जीवनातील इतर कार्यसंस्थांनाही लागू करण्याचा प्रयत्न केला.शाळा,इस्पितळे,तुरूंग,राजकीय नोकरशाह्या आणि इतर संस्थांनी त्यामुळे कारखान्याची वैशिष्टये उचलली.तेथील कामाची विभागणी,तेथील ज्येष्ठताक्रम,तेथील कठोर अलिप्तता या व अशा इतर काही गोष्टी.कलेच्या क्षेत्रात देखील आपल्याला कारखान्यातील काही तत्त्वें आढळून येतात.

तीन लेखातील दुसरा भाग…१६.०६.२६ रोजी पहिला भाग प्रकाशित.

6/24/26

संस्कृतीची बांधणी / The construction of culture

तीनशे वर्षापूर्वी - पन्नास वर्षे आगे मागे म्हणा हवे तर एक स्फोट झाला आणि त्याने साऱ्या भूतलावर आघात करणाऱ्या जबरदस्त धक्कादायक लाटा इतस्ततः झुगारल्या,आणि जुन्या समाजसंस्था मोडूनतोडून एक पूर्णतः नवीन संस्कृती घडवली.अर्थात हा स्फोट म्हणजे औद्योगिक क्रांती.त्याने साऱ्या जगात उठविलेल्या लाटा राक्षसी ताकदीच्या असून त्यांनी पूर्वीच्या प्रचलित असलेल्या सर्व संस्थांवर धडक मारली. ह्या 'दुसऱ्या लाटेने' लाखो लोकांचा जीवनक्रमच बदलून टाकला.

पहिल्या लाटेची संस्कृती जेव्हा अधिकारारूढ होती,त्या हजारो वर्षे व्यापणाऱ्या प्रदीर्घ कालखंडात पृथ्वीवर अस्तित्वात असलेल्या लोकांचे दोन प्रकारात विभाजन करता येत होते:अतिशय प्राचीन काळच्या मानवाच्या धाटणीतच राहिलेला मागास,आदिमानव,आदिवासी हा एक प्रकार,आणि दुसरा प्रकार म्हणजे 'सुसंस्कृत' 'नागर मानव.तथाकथित आदिवासी छोटे गट बनवून किवा टोळया तयार करून एकत्र येणे,शिकार करणे, मासेमारी करणे यातच गुंतून राहिले आणि म्हणून शेतीने केलेल्या क्रांतीने त्याला मागे टाकले.

या उलट 'सुसंस्कृत' जग म्हणजे मुख्यतःपृथ्वीच्या ज्या भागावर लोकांनी जमिनीवर मशागत करणे स्वीकारले, तो भाग होय.कारण जेथे शेती अस्तित्वात येऊन तिचा विकास झाला,त्या ठिकाणी संस्कृतीने मूळ धरले.चीन व भारत यांपासून बेनिन व मेक्सिको, ग्रीस व रोममध्ये संस्कृती उदयाला आल्या,आणि कोसळल्या.झगडे होत राहिले,वितळून जाऊन सांधे जुळलेही आणि असे घडत घडत वेगळेच आकर्षक मिश्रण निर्माण होत राहिले.

तथापि,त्यांच्या वैविध्यामागे,विरोधामागे मूलभूत साम्येच अस्तित्वात होती त्या सर्वामध्ये,अर्थव्यवस्थेचा पाया 'जमिनीवर आधारलेला होता आणि जीवन खेड्यांभोवतीच गुंफले गेलेले होते.त्या सर्वांमध्ये कामाची,श्रमाची साधी सरळ विमागणी अस्तित्वात होती आणि काही स्पष्ट स्वरुपाच्या जाति आणि वर्ग यांचा उदय झाला.खानदान,पौरोहित्य,योध्ये,दलित, गुलाम किंवा वेठबिगार.त्या सर्वामध्ये फक्त सामर्थ्यवानच श्रेष्ठ ठरत होता,'अधिकारी' होत होता. त्या सर्वांमध्ये मनुष्याच्या जन्मानुसारच त्याचे समाजातील स्थान ठरत होते.त्या सर्वांमध्ये अर्थव्यवस्था विकेंद्रित होती,त्यामुळे प्रत्येक जमात आपणास आवश्यक असणाऱ्या वस्तू निर्माण करत होती.

याला काही अपवाद होतेच इतिहासात काहीच कधी साचे सरळ,ठोकळेबाज असू शकत नाही काही व्यापारी संस्कृतीही अस्तित्वात होत्या.नाविक लोक व्यापारासाठी समुद्र पार करुन जात होते.काही अतिशय केंद्रीभूत अशी राज्ये होती.तेथील राज्यसत्ता प्रचंड पाणीपुरवठा योजना तयार करीत असत.परंतु असे काही फरक असूनही,या विशिष्ट वाटणाऱ्या संस्कृतीचे खास असे मूल्यमापन करुनही आपण असे म्हणू शकतो की पहिल्या लाटेने जी संस्कृती सर्वभर पसरवली ती शेती संस्कृतीच होय.

ह्या संस्कृतीचा प्रभाव असताना कधीकधी भावी घटनांच्या सूचनाही मिळत होत्या ! जुन्या ग्रीस व रोममध्ये अपरिणत अवस्थेतील,मोठ्या प्रमाणात उत्पादन करणारे,काही कारखाने निर्माण झाले होते. इ.स.पूर्व ४०० या काळात एका ग्रीक बेटात तेल (जमिनीतील) उपसून काढले जात होते.

ब्रह्मदेशातही इ.स.१०० या काळात हे शक्य झाले होते.बाबिलोनिया आणि इजिप्त या देशात मोठ्या प्रमाणात नोकरशाह्या फोफावल्या होत्या.आशिया आणि दक्षिण अमेरिकेत मोठी केंद्रे ठरतील अशा अनेक शहराची निर्मितीही झाली होती.तेथे पैसे आणि चलनी स्वरुपातील विनिमयही होत होता.कॅथेपासून कॅलाइसपर्यंत व्यापाराच्या मार्गाची जाळी वाळवंटे समुद्र आणि पर्वतराजी यांतून पसरलेली होती.शिवाय बाल्यावस्थेतील नगरपालिका आणि प्राथमिक अवस्थेतील राष्ट्रेही अस्तित्वात होती.प्राचीन अलेक्झांड्रियामध्ये खरोखरच आश्चर्यकारक ठरेल अशी एक गोष्ट अस्तित्वात होती,तो म्हणजे वाफेच्या इंजिनाचे आदिस्वरुप !

तरी देखील ज्याला दूरान्वयानेही औद्योगिक संस्कृती म्हणता येईल असे काहीही तेव्हा अस्तित्वात नव्हते. ज्यांना भविष्यकाळातील चुणुका म्हणता येतील अशा वरील काही गोष्टी म्हणजे इतिहास काळातील विक्षिप्त घटनाच म्हणावयास हव्यात.त्या देखील वेगळाल्या ठिकाणी आणि वेगवेगळया काळात अशा तुटकपणे विखुरल्या गेल्या असल्याचे ध्यानात येईल.त्या कधीही सुसूत्र पध्दतीत एकत्र आणल्या गेल्या नव्हत्या;त्या तशा आणता आल्याही नसत्या.म्हणून आपण इ. स. १६५०-१७५० पर्यंतच्या जगाला पहिल्या लाटेचे जग म्हणू शकतो.प्राचीनपणाच्या काही अपवादांच्या आणि औद्योगिक भविष्याच्या सूचना देणाऱ्या काही घटनांचा विचार करुनही आपण असे म्हणू शकतो,की शेती संस्कृतीनेच या काळात पृथ्वीवर प्रभुत्व होते, आणि जणू काही ते तसेच कायम रहाणार आहे असा भास तरी होत होता;

आणि अशा या जगात औद्योगिक क्रांतीचा उद्रेक झाला. आणि एक मोठी प्रचंड सांस्कृतिक लाट उसळली. आणि तिने एक विचित्र,समर्थ आणि वेडया ताकदीची अशी प्रतिसंस्कृती निर्माण केली.हा औद्योगिकपणा म्हणजे धुराडी आणि यत्रांची जुळणी यांच्याहून खूप काही अधिक असा होता. मानवी जीवनाच्या प्रत्येक भागाला स्पर्श करुन जाणारी अशी ती एक विविधांगी समाजपध्दती होती,आणि तिने पहिल्या लाटेच्या प्रत्येक वैशिष्ट्यावर हल्लाही चढविलेला होता.तिने डेट्रॉइटच्या बाहेर प्रसिध्द विलो रन ही मोठी फॅक्टरी काढली,परंतु तिने शेतावर ट्रॅक्टरची योजन ही केली,ऑफिसमध्ये टाइपरायटर आणि स्वयंपाक घरात रेफ्रिजरेटर बसविला.तिने दैनिक वृत्तपत्रे निर्माण केली.सिनेमाला जन्म दिला,जमिनी खालून जाणाऱ्या गाड्या व डी सी-३ प्रकारची विमाने दिली, त्रिमिति दिली,बारासुरी संगीत दिले,बाँहोस इमारती दिल्या.बार्सेलोना खुर्ष्या दिल्या,बैठे संप दिले, जीवनसत्वांच्या गोळ्या दिल्या,जीवनमर्यादा वाढवून दिली.मनगटी घड्याळे आणि मतपेट्यांना जागतिक पातळीवरील अस्तित्व दिले.आणि अधिक महत्त्वाची गोष्ट ही की या सर्व गोष्टींना एकमेकींशी जोडून दिले. एखाद्या यंत्राप्रमाणे त्यांचा संयोग केला.आणि त्यायोगे आजवरच्या जगातील सर्वात सामर्थ्यशाली सुसंघटित व्याफक समाजपद्धतीची रचना केली.दुसरी लाट-संस्कृतीची.

हिंसामय' उत्तर

ही दुसरी लाट पसरत पसरत वेगवेगळ्या समाजांना जाऊन भिडत असताना जुन्या लुप्तमान शेती संस्कृतीचे रक्षणकर्ते आणि औद्योगिक भविष्याचे कैवारी यांच्यात दीर्घकाळपर्यंत रक्तरंजित लढा होत गेला.पहिल्या आणि दुसऱ्या लाटेचे पाईक एकमेकांवर तुटून पडत.टकरा घेत असताना मधेच येणारे आदि संस्कृतीचे आदिवासी बाजूला सारले गेले; त्यांचा मोठ्या प्रमाणात नाश झाला.

अमेरिकेत,शेती संस्कृती स्थापून तिचा विस्तार करण्याचे धोरण ठरवून युरोपियनांनी आगमन केले,तेव्हा है विरोध,हया टकरी सुरु झाल्या.एक गोरी निष्ठुर शेतीप्रधान लाट,इंडियन लोकांना नागवत,त्यांच्याकडून ताबा मिळवत शेतांची स्थापना करत,शेतीप्रधान गावं वसवत पुढे पुढे सरकत धडाक्याने पॅसिफिककडे चालली आणि त्याला जाऊन भिडलीही !

परंतु दुसऱ्या लाटेच्या दूतांनी या सुस्थित शेतक-यांची अशीच दशा उडवून दिली.न्यू इंग्लंड आणि मध्य अटलांटिक राज्यात कारखाने आणि शहरे वेगाने आपला पसारा मांडू लागली.एकोणीसाव्या शतकाच्या मध्याच्या सुमाराला ईशान्य भागात मोठ्या वेगात औद्योगिक विभागाची वाढ होत गेली.पिस्तुले,घडयाळे, शेती औजारे कापडनिर्मिती,शिवण यंत्रे आणि इतर वस्तू निर्माण करणारे कारखाने उभे राहिले.देशाचा इतर भाग मात्र अजूनही शेतीच्या आधिपत्याखाली होता.पहिल्या आणि दुसन्या लाटेच्या ताकदींमध्ये आर्थिक आणि सामाजिक तणाव तीव्रतेने वाढत गेले.इतके,की इ. स.१८६१ मध्ये दोघांत सशस्त्र भडके उडाले.

अनेकांना वाटले त्याप्रमाणे यादवी युद्ध गुलामीसारख्या नैतिक विषयावरुन किवा जकातीसारख्या लहान आर्थिक विषयावरून लढले गेले नव्हते.ते एका फार मोठ्या प्रश्नावरुन लढले गेले होते.तो प्रश्न असा होता, की हा नवा श्रीमंत खंड कोणाच्या सत्तेखाली असावा ? शेतक-यांच्या का उद्योजकांच्या ? पहिल्या लाटेच्या? की दुसऱ्या ? त्याच प्रमाणे प्रश्नाचे स्वरुप असेही होते, की भावी अमेरिकन समाज मूलतः शेतीप्रधान असावा की उद्योगप्रधान ? उत्तरेकडील सैन्याच्या विजयानंतर मग साचा निश्चित झाला आणि अमेरिकन संयुक्त संस्थानांचे औद्योगिकीकरण निश्चित झाले.मग त्या वेळे नंतर अर्थकारणात,राजकारणात,सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनात शेतीची पीछेहाट होत गेली आणि उद्योगांची भरभराट होत राहिली.रोरावत येणान्या दुसऱ्या लाटेने पहिलीला ओहोटी दाखवली !

दोन सस्कृतींच्या अशाच चकमकी इतरत्र देखील उठल्या.जपानमध्ये इ.स. १८६८ मध्ये सुरु झालेले मेरजी रेस्टोरेशन म्हणजे जपानी ढंगात लढला गेलेला शेतीमय इतिहास आणि उद्योगमय भविष्य यांच्यातला तोच झगडा होय. इ.स. १८७६ पर्यंत झालेला सरंजामशाहीचा निःपात इ. स. १८७७ मध्ये झालेले सात्सुमा वंशाचे बंड, इ.स १८८९ मध्ये, स्वीकारलेली पाश्चिमात्य ढंगाची रचना,या सर्व गोष्टी म्हणजे पहिल्या आणि दुसऱ्या लाटांच्या संघर्षाची परावर्तनेच होत.जपानने प्राप्त केलेल्या औद्योगिक सत्तेतील अग्रस्थानाच्या दृष्टीने पडलेली ही पहिली पावले म्हणावी लागतील.

रशियात देखील पहिल्या आणि दुसऱ्या लाटेतील संघर्ष उद्भवले.इ.स.१९१७ मध्ये झालेली रशियातील क्रांती म्हणजे अमेरिकन यादवी युद्धाची पुनरावृत्ती.प्रथम वाटले त्याप्रमाणे सुरुवातीला लढा साम्यवादावरुनच झाला.परंतु नंतर मात्र तो औद्योगिकीकरणावरुनच झाला.ज्यावेळी बोल्शेविकांनी वेठबिगारी आणि सरंजामी साम्राज्याचे उरलेसुरले अवशेष निपट्न काढताना शेतीला मागे सारले आणि त्याचवेळी औद्योगिकीकरणाला गती दिली.ते दुसऱ्या लाटेच्या पक्षाचे झाले.एकामागून एका देशात हाच पहिल्या आणि दुसऱ्या लाटेच्या पक्षपात्यांमधका झगडा फुटत राहिला आणि त्यामुळेच राजकीय पेच व उलथापालथी, संप,उठान,लष्करी क्रांत्या आणि लढाया निर्माण होत राहिल्या

आज उत्तर गोलार्धात पंचविसाव्या आणि पासष्ठाव्या अक्षांशांच्या दरम्यान औद्यौगिक पट्ट्याने पृथ्त्री वेढली आहे उत्तर अमेरिकेत सुमारे २५० दशलक्ष लोक उद्योग प्रधान जीवनपद्धती अवलंबीत आहेत.पश्चिम युरोपात,स्कैंडिनेव्हिया ते दक्षिणेकडील इटलीपर्यंत, आणखी अब्जावधी लोकांनी हीच जीवनपद्धती अंगिकारली आहे.याच्या पूर्वेला युरेशियन प्रदेश म्हणजे युरोपाचा पूर्व भाग आणि रशियाचा पश्चिम भाग आहे आणि या प्रदेशातही तेवढेच लोक उद्योगप्रधान समाजाचा भाग बनून जगत आहेत,असे आपल्याला आढळून येईल.आणि शेवटी आपण आशियाच्या औद्योगिक भागात येऊन ठेपतो.जपान,हाँगकाँग, सिंगापूर,तैवान,ऑस्ट्रेलिया, न्यू झिलंड आणि दक्षिण कोरियाचे तसेच चीनचे काही भाग याच्या आवाक्यात येतात.येथेही अब्जावधी लोकांनी 'उद्योगा'चा आसरा घेतलेला आपल्याला आढळून येईल.एकूण,जगातील सुमारे एक चतुर्थाग लोकांना औद्योगिक संस्कृतीने अंकित केलेले आहे. (या विभागात सर्वसाधारणपणे मेक्सिकोमधील मेक्सिको सिटी,भारतातील मुंबई अशा आणखीही बऱ्याच ठिकाणांचा अंतर्भाव करता येईल)

भाषा, संस्कृति, इतिहास, राजकारण यांचे तीव्र भेद असूनही हे भेद इतके तीव्र आहेत,की त्या बाबींवरुनच युद्धे खेळलो गेली आहेत.ह्या सर्व,दुसऱ्या लाटेने प्रभावित केलेल्या समाजाची काही समान अंगेही आहेत.खरेच,या सर्व प्रख्यात भेदांच्या मागे गुप्तरुपाने साम्याचे तळ ठाण मांडून आहत.

आणि आजच्या टक्कर घेणा-या बदलाच्या लाटा समजण्यासाठी आपल्याला सर्व उद्योगप्रधान देशातील समाजरचनांची ओळख पटणे आवश्यक आहे.कारण दुसऱ्या लाटेच्या संस्कृतीचा हाच अव्यक्त सांगाडा आहे. कारण खुद्द हीच ओद्योगिक चौकट आता हादरत आहे !

सजीव विजेत्र्या

कोणत्याही संस्कृतीची पूर्वपीठिका म्हणजे उत्साह, शक्ती ही असते.मग तो संस्कृती जुनी असो की नवी.पहिली लाट-समाज आपली शक्ती सजीव विजेऱ्यांकडून मिळवीत असत-मानवी किंवा प्राण्यांच्या स्नायु बळांपासून,किंवा सूर्य,वारा आणि पाणी यांच्या पासूनही मिळवत असत.अन्न शिजवण्यासाठी आणि उष्णता निर्माण करण्यासाठी जंगले तोडली जात,पाणचक्यांनी (यातील काही भरतीच्या लाटांमुळे चाललेल्या ) गिरण्यांच्या तळया चालवल्या,तसेच शेतांमध्ये पवनचक्या करकरू लागल्या.प्राण्यांनी नांगर ओढले. फ्रेंच राज्यक्रांतीपर्यंतच्या काळात,युरोप आपणाला हवी असलेली शक्ती सुमारे १४ दशलक्ष घोडे व सुमारे २४ दशलक्ष बैल यांच्यापासून मिळवत होता, असे अनुमान आहे.याप्रमाणे सर्व पहिली लाट संस्कृतीच्या समाजांनी नूतनीकरण करता येण्याजोग्या शक्ति उगमांचा पुरेपूर वापर करुन घेतला.या लोकांनी तोडलेली जंगले निसर्ग पुनः उगवू शकत होता.शिडे भरणारे वारे भरून निघत होते.चाके फिरवणारे पाणी नद्यांमध्ये पुनः येत होते फार कशाला,शक्ती पुरवणारे गुलाम मानव आणि प्राणी या दोन्ही प्रकारचे देखील जागा मोकळी राहू देत नव्हते!

या उलट दुसऱ्या लाटेचा अंगिकार करणाऱ्या सर्व समाजांनी आपणाला हवी असणारी ऊर्जा,कोळसा,

वायु,तेल या पुनः भरून काढता न येणाऱ्या खडकजन्य इंधनाचा वापर करून मिळवायला सुरुवात केली.हा क्रांतिकारक बदल इ.स. १७१२ मुध्ये न्यू कोमेन याने अति उपयुक्त वाफेच्या इंजिनाचा शोध लावल्यानंतर घडला.आणि याचा अर्थ असा झाला,की निसर्गसंपत्तीने पुरविलेल्या भांडवलावरील व्याज वापरण्याचे सोडून या संस्कृतीने खुद्द भांडवलाचाव घास घ्यायला सुरुवात केली.पण अशा तन्हेने पृथ्वीच्या पोटात दडलेले ऊर्जासाठे खणणे ही गोष्ट औद्योगिक संस्कृतीला मिळालेले मोठेच सहाय्य ठरले आणि त्यामळे तिच्या आर्थिक भरभराटीचा वेग वाढला.आणि मग त्या क्षणानंतर आतापर्यंत जिथे जिथे म्हणून दुसरी लाट जाऊन पोचली तेथील देशांनी उत्तुंग तांत्रिक आणि आर्थिक इमले अशा समजुतीवर उभारले,की ही भूगर्भीय संपत्ती आपल्याला अखंड मिळतच रहाणार आहे.

पूर्वेकडील आणि पश्चिमेकडील समाजवादी, त्याचप्रमाणे भांडवलशाही समाजांकडून हेच धोरण अवलंबिले गेले-विखुरलेली किंवा केंद्रीभूत शक्ती,संपून जाणारी आणि पुनः भरुन येऊ शकणारी शक्ती,अनेक निरनिराळया ठिकाणांतून मिळणारी शक्ती मिळवत रहाणे,वापरत रहाणे.भूगर्भीय ऊर्जा हा दुसन्या लाटेच्या अंमलाखालील सर्व समाजांचा जणू पायाच ठरून गेला.

तंत्रज्ञानाचे उदर

नव्या ऊर्जापद्धतीकडे घेतलेल्या ह्या उडीच्या जोडीनेच तंत्रज्ञानाच्या दिशेने होणारी प्रगतीही फार मोठ्या वेगात व प्रमाणात होत होती.व्हिट्ट व्हिअसने सुमारे दोन हजार वर्षांपूर्वी ज्यांना ' आवश्यक शोध' म्हटले होते, त्यांच्यावर पहिल्या लाटेतील समाजाने भर दिला होता. सुरुवातीच्या काळातील रहाट,तरफ,द्राक्षे गाळण्याची यंत्रे.बेचक्या,कप्प्या,याऱ्या ह्या गोष्टी केवळ मानवाच्या आणि प्राण्यांच्या शक्ती अधिक वाढवण्यासाठीच मुख्यतः वापरण्यात येत होत्या.

दुसऱ्या लाटेने तंत्रज्ञान वेगळ्याच अशा नव्या पातळीवर नेऊन ठेवले.तिने विजेवर चालणाऱ्या,हलणाऱ्या विभागांची,पट्ट्यांची,नळाची,बेरिग्जची,नट,बोल्टें यांची फार मोठ्या प्रमाणात वीण केली.ह्या सर्वांनी आपल्या दातेरी चाकांवर फिरत कडकडाट,गडगडाट उठवणे अव्याहत चालू ठेवले.मानवाच्या किंवा प्राण्याच्या ताकदीला जोड देण्यापेक्षा कितीतरी अधिक कार्य या नव्या यंत्रांनी केले.ह्या ओद्योगिक संस्कृतीने ज्ञानेंद्रिये तयार केली.अधिक अचूकपणे ऐकू शकणारी,पाहू शकणारी,स्पर्श करू शकणारी यंत्रे तयार केली. मनुष्यप्राण्यापेक्षा कितीतरी अचूक आणि निःसंदिग्धपणे ज्ञान प्राप्त करण्याची त्यांची कुवत मोठी आहे.ह्या संस्कृतीने तंत्रज्ञानाला एक असे उदर बहाल केले,की ज्याच्यातून नवीन यंत्रांना जन्म देण्याचा क्रम चालूच ठेवणारी अशी यंत्रे तयार झाली.उदा. यंत्रांचे सुटे भाग तयार करणे इत्यादी.यापेक्षा महत्वाची गोष्ट म्हणजे एकमेकांशी संबंधित,एकमेकांवर अवलंबित अशी एक प्रकारची साखळी तयार करणारी यंत्रे एकाच छपराखाली आणून मोठाले कारखाने या संस्कृतीने उभे केले….!!! तिसरी लाट अलविन टॉफलेर यांच्या Third Wave या पुस्तकाचा अनुवाद शरदिनी मोहिते यांनी केला आहे तर,प्रकाशक महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ पुणे.

हा भाग तीन लेखामध्ये प्रकाशित केला जाईल.

6/22/26

वेळेचं भान / sense of time

पृथ्वीतलावरील अनेक अक्षांश प्रदेशात साधारण शरद ऋतूमध्ये पानझड होते आणि वसंतात नवीन पालवी फुटते.आपण हे गृहीतच धरलेलं असतं.पण जरा निरखून बघितलं तर हे एक मोठं गूढच आहे.कारण असं होण्यासाठी झाडांना वेळेचं भान हवं.हिवाळा येत आहे हे त्यांना कसं कळतं? किंवा वाढलेली उष्णता ही तात्पुरती नाही तर वसंत ऋतूचे आगमन होत आहे,हे तरी कसं कळतं ?

उबदार दिवसात झाड आपल्या पानांची वाढ करतं हे तर्कशुद्ध आहे,कारण खोडातील द्रव्य वितळले तरच पुन्हा त्याचा प्रवाह सुरू होतो.पण जेव्हा हिवाळा जास्त कडक असतो तेव्हा पानं लवकर उमलतात,हे मात्र आश्चर्यकारक आहे.टेक्निकल युनिव्हर्सिटी ऑफ म्युनिकच्या शास्त्रज्ञांनी या घटनेचा हवामान नियंत्रित प्रयोगशाळेत शोध घेतला.हिवाळा थोडाजरी कमी थंड असला तरी बीचच्या फांद्यांना उशिरा पालवी फुटत होती.प्रथमदर्शनी त्यांना हे तर्कहीन वाटलं,कारण जास्त गरमी असलेल्या वर्षांमध्ये वाइल्ड फ्लावर सारखी अनेक वनस्पतींची वाढ जानेवारीतच सुरू होते आणि काही काहींना फुलेही धरतात.अनेकदा याची बातमी वृत्तपत्रातून येते.कदाचित असे असेल की प्रचंड गारठा असेल तरच झाडांना गाढ झोप मिळते.अशी प्रफुल्लित करणारी गाढ झोप नाही मिळाली तर वसंतात ते लगेच कामाला लागू शकत नाहीत.कारण काहीही असो. हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर हा एक तोटाच आहे, कारण इतर प्रजाती अशा प्रकारे थकलेल्या नसतात. आपली पालवी ते लगेच वाढवू लागतात आणि शर्यतीत पुढे जातात.

जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये उबदार वातावरण आपण अनेकदा अनुभवलं आहे.तेव्हा ओक किंवा बीचला पालवी फुटलेली नसते.अजून वाढीला सुरुवात करायची नाही,हे त्यांना कुठून कळतं? हे कोडं आपल्याला सुटू लागलं आहे,किमान फळं लागणाऱ्या झाडांचे तरी. झाडांना मोजता येतं हे आता आपल्या लक्षात येत आहे! काही ठरावीक उष्ण दिवस गेले की मगच वसंत ऋतूच्या आगमनाची खात्री झाडांना पटते.पण फक्त उबदार दिवसांनीच वसंत ऋतू आले,असं मानलं जात नाही.पानझड आणि नवीन पालवी फुटणे या दोन्ही गोष्टी जशा तापमानावर अवलंबून असतात तशा दिवसाच्या लांबीवरही असतात.

उदाहरणार्थ,दिवसातले किमान तेरा तास उजेड असला की मगच बीच वृक्ष नवीन पालवी सुरू करतात.हे फारच आश्चर्यकारक आहे,कारण असे करण्यासाठी झाडांना कोणत्यातरी प्रकारची दृष्टी पाहिजे.त्या दृष्टीचा शोध पानातच घेणं योग्य ठरतं.कारण त्यांच्यामध्ये सौर ऊर्जा झेलण्यासाठी जणू एक यंत्रच असते.

उन्हाळ्यात झाड सौर ऊर्जा घेत राहतात पण एप्रिलमध्ये अजून पालवी फुटलेली नसते.हे गुपित आपल्याला नीट कळलं नाही, पण बहुधा ही क्षमता कोंबांमध्येसुद्धा असते.कोंबांमध्ये पानं घडी घातलेल्या अवस्थेत शांतपणे बसलेली असतात.ती सुकून जाऊ नये म्हणून त्यांच्यावर तपकिरी रंगाचे आवरण असते.पानं वाढू लागली की या आवरणाकडे नीट बघा.त्याला प्रकाशासमोर धरले की ते पारदर्शक असल्याचे जाणवेल.अगदी थोडा सूर्यप्रकाश असला तरी त्यावरून दिवस किती मोठा आहे ते खोडांना,कोंबांना कळून चुकते.ही क्षमता तर शेतात उगवणाऱ्या काही तणांनाही असते.थोडा चंद्रप्रकाश जरी पडला तरी त्यांच्या बिया रुजायला सुरुवात होते. अशाच प्रकारे झाडाच्या खोडांनाही सूर्यप्रकाश पडल्याचे जाणवते.बहुतांश झाडांच्या खोडामध्ये निद्रावस्थेत असलेले कोंब असतात.आपला शेजारी वठून पडला की झाडाला अधिक ऊन मिळू लागते आणि मग हे कोंब बाहेर पडून प्रकाशाचा फायदा घ्यायला सज्ज होतात.

द हिडन लाईफ ऑफ ट्रीज

पी ट र वो ह्ल ले बे न

अनुवाद - गुरुदास नूलकर

अरविंद घनश्याम पाटकर

 मनोविकास प्रकाशन

पण गरमीचे दिवस वसंत ऋतूचे आहे आणि उन्हाळ्याचा शेवट नाही हे झाडांना कळतं कसं ? तापमान आणि दिवसाची लांबी या दोन्हीच्या आधाराने झाडाला हे जाणवतं.तापमानात वाढ होते तो वसंत ऋतू.तापमान घटू लागते तेव्हा शरदऋतू हेही झाडांना माहीत असते.आणि म्हणूनच उत्तर गोलार्धावरील ओक किंवा

बीच वृक्ष जेव्हा आपण दक्षिण गोलार्धात वसलेल्या न्यू झीलंडला निर्यात करतो तेव्हा ही झाडं तिथल्या उलट ऋतूचक्राशी अनुकूलन करून घेतात. आणि हो,झाडांना स्मरणशक्ती असते हेही यातून सिद्ध होते.नाहीतर त्यांना दिवसाची लांबी किंवा गरमीचे दिवस कसे मोजता येतील?

शरद ऋतूत जर का उष्णता नेहमीपेक्षा जास्त वाढली तर मात्र झाडं गोंधळून जातात.सप्टेंबर महिन्यातच त्यांचे कोंब वाढू लागतात आणि काही झाडांवर चक्क नवीन पालवी धरते.हिवाळा उशिराने आला की या गोंधळलेल्या झाडांना मात्र त्याचे परिणाम भोगावे लागतात.या नव्याने वाढलेल्या रोपट्यांचे लाकूड टणक न झाल्यामुळे ते थंडीचा मुकाबला करण्यासाठी तयार नसतात,आणि त्यांच्याबरोबर पानंही हतबल असतात. आणि मग पानांची हिरवाई गोठून जाते.हे झाडांना नक्कीच दुःखदायक असणार.आणि त्याहून वाईट म्हणजे हे कोंब निकामी झाले की पुढच्या वसंतात पुन्हा नवीन कोंब करण्यासाठी ऊर्जा खर्च करावी लागते. झाडाने सावधगिरी बाळगली नाही तर ते अशक्त राहून येणाऱ्या ऋतूचा सामना करणे त्यांना मुष्कील जाते.

पालवी फुटण्याची वेळ ठरविण्याव्यतिरिक्तही झाडांना वेळेचे भान असणे गरजेचे असते.विशेषतः प्रजननात हे महत्त्वाचे असते.

त्यांच्या बिया जर शरद ऋतूत जमिनीवर पडल्या तर त्या लगेच रुजणे अपेक्षित नाही. तसं झालं तर दोन समस्या निर्माण होतात.पहिली समस्या, नाजूक कोंबांना टणक होण्यास वेळ मिळालेला नसतो म्हणून ते गारठून जातात.आणि दुसरं म्हणजे थंडीच्या काळात हरणांना खाद्य कमी असल्यामुळे ते या ताज्या हिरव्या कोंबांवर तुटून पडतात.म्हणून इतर सर्वांबरोबर वसंत ऋतूमध्ये रुजणे हेच शहाणपणाचे असते.त्यासाठी बियांना थंडीची जाणीव असते.उष्ण दिवस सलग आले की मगच ही पिल्ले आपल्या सुरक्षा कवचातून बाहेर पडतात. झाडांसारखी व्यवस्थित मोजण्याची क्षमता अनेक बियांना नसते आणि म्हणून खारी किंवा 'जे' पक्षी जेव्हा बीचचे दाणे एखाद-दोन इंच जमिनीत पुरतात तेव्हा त्यांचे फावते.जमिनीच्या या भागात वसंत ऋतूचे पूर्ण आगमन झाल्याशिवाय ऊब नसते.बर्च सारख्या हलक्या बियांना मात्र जास्त लक्ष द्यावे लागते.त्यांच्या पंखांच्या साहाय्याने ते जमिनीवर पोचून शांतपणे वाट पाहात पडलेले असतात.ते कुठे पडतात,यावर त्यांना भरपूर सूर्यप्रकाश मिळेल की पालकांसारखे त्यांनाही सबुरीने 'त्या' दिवसाची वाट पाहावी लागेल हे ठरते.

प्रश्न चारित्र्याचा..!!

'ह्यूमेल' या माझ्या गावातून 'आहर' दरीकडे जाणाऱ्या रस्त्यावर तीन ओक वृक्ष आहेत.भारदस्तपणे ते तिथे उभे आहेत आणि म्हणून या भागाला त्यांच्या नावाने सन्मानित केले आहे.सुमारे शंभर वर्ष जुन्या असलेल्या या वृक्षांमध्ये जेमतेम काही इंच अंतर आहे.हे जरा विलक्षण आहे आणि याचा अभ्यास करण्याची मला चांगली संधी आहे.

कारण तीनही वृक्ष अगदी एकसारख्या पर्यावरणीय परिस्थितीत वाढले आहेत.काही यार्डाच्या अंतरावर जमीन,पाणी आणि सूक्ष्म हवामान वेगळे असणे शक्य नाही.म्हणजे जर या तीन वृक्षात काही फरक असला तर तो त्यांच्या अंगभूत गुणधर्मामुळे असणार.आणि या तिघांचेही आचरण वेगळे आहेच!

हे वृक्ष थंडीत बोडके असताना किंवा उन्हाळ्यात गर्द पालवीने भरलेले असताना कुणी धावत्या गाडीतून यांच्याकडे पाहिले तर हे तीन वृक्ष आहेत,हे जाणवणारच नाही.जवळ असल्यामुळे हा एकच डेरा असल्याचे भासते आणि तिन्ही खोडं एकाच मुळापासून निघाल्यासारखे वाटते.छाटलेली झाडे पुन्हा उगवताना काही वेळा असे होते.पण तिन्ही ओक वृक्ष शरद ऋतूत वेगवेगळे रंग धारण करतात.उजवीकडचा ओक जेव्हा रंग बदलायला लागतो तेव्हा मधला आणि डावीकडचा अजून हिरवाच असतो.या दोन आळशी झाडांना आपल्या मित्रासारखे निष्क्रिय होण्यासाठी अजून दोन आठवडे तरी लागणार असतात.पण जर ते एकाच परिस्थितीत वाढतात तर मग त्यांच्या वागणुकीत हा फरक कुठून येतो? यावरून असं दिसतं की,पानं झडण्याची वेळ स्वभावाप्रमाणे बदलते.आधीच्या प्रकरणात पाहिल्याप्रमाणे पानझडी वृक्षांना आपली पाने झडून टाकावी लागतात.पण त्याची बरोबर वेळ कोणती? झाडांना थंडी पडण्याची बरोबर वेळ माहीत नसते.हिवाळा कडक असणार का सौम्य तेही ठाऊक नसते.त्यांना फक्त दिवस लहान होत चालल्याची आणि तापमान घटत असल्याची जाणीव होते.पण शरद ऋतूतले काही दिवस असाधारणपणे उष्ण असतात. अशा वेळेस मात्र ओक वृक्ष संभ्रमात पडतात.या हवेत प्रकाश संश्लेषण करून थोडी जास्त ऊर्जा आणि साखर बनवून ठेवायची का? की कधीही हिमवृष्टी होऊ शकेल याची सावधगिरी बाळगून पानं झडून टाकायची? या समस्येचे निवारण प्रत्येक झाड वेगळ्या पद्धतीने करत असल्याचे स्पष्ट दिसते.

उजवीकडचे झाड जरा जास्त चिंता करणारे आहे किंवा अधिक समजूतदार आहे म्हणू या.पानझड करता आली नाही आणि पूर्ण हिवाळा मरणाच्या भीतीत घालवावा लागला तर जास्त अन्नसाठा पुरवठा करून ठेवण्याचा काय फायदा? म्हणून ते वेळच्या वेळी पानझड करून स्वप्नांच्या जगात पाऊल ठेवते.पण इतर दोन वृक्ष मात्र जरा जास्त धीट आहेत.पुढला वसंत ऋतू कसा असेल किंवा कीटकांनी आक्रमण करून ऊर्जा संपवली तर खिशात काय राहणार,असा विचार करून ते अधिक काळ हिरवे कपडे घालून असतात.आणि सालापासून मुळापर्यंत जमेल तिथे तुडुंब साठा भरून ठेवतात. आजपर्यंत तरी त्यांच्या या आचरणाचा त्यांना फायदाच झालेला आहे,पण हे किती काळ चालेल कोणास ठाऊक? जागतिक तापमान बदलामुळे शरदातील तापमान जास्त काळ टिकते आणि यांची पानं धरून ठेवण्याची युक्ती नोव्हेंबरपर्यंत फायदेशीर ठरते.पण याच काळात शरदातील वादळे न चुकता येत राहतात. यामध्ये पानांनी भरलेले झाड पडण्याचा धोका जास्त असतो.माझ्या अंदाजाप्रमाणे अशा वेळेस सावधानता बाळगणारी झाडं जगण्याची शक्यता जास्त असते.

पानझडी वृक्ष आणि सिल्वर फरच्या खोडावर असेच काही तरी दिसून येते.झाडांच्या शिष्टाचार नियमावलीप्रमाणे यांची खोडे नितळ आणि उंच असली पाहिजेत.म्हणजे खालच्या भागावर फांद्या नकोत,हे शहाणपणाचे आहे.कारण खाली फारसा सूर्यप्रकाश पोचत नाही.म्हणून उगीचच खालच्या भागातले अवयव वाढवून त्यांना पोसत बसण्याची जरूर नाही.हे साधारण आपल्या शरीरासारखेच असते.जे स्नायू वापरले जात नाही त्यांना आपले शरीर फार पोषण देत नाही.पण फांद्या झाडांना स्वतःहून काही तोडता येत नाहीत.त्या गळून पडण्याची त्यांना वाट पाहावी लागते.त्यांना बरशीच्या हवाली सोडन दिले की लाकूड कुजून त्या मरून जातात आणि विघटन होऊ पुन्हा त्यांचा सेंद्रिय माल मातीत मिसळतो.अशा प्रकारे फांदी जिथे तुटते तिथे झाडाला जखम होते.बरशी खोडापर्यंत वाढू शकते कारण आता तिथे साल नसते.पण ही परिस्थिती झाडाला बदलता येते. पडलेली फांदी जर एखादा इंच जाड असली तर काही वर्षांतच तिथे साल धरते.आता तिथे आर्द्रता वाढवून झाड बुरशीला मारून टाकते.पण जर तुटलेली फांदी फारच जाड असेल तर या प्रक्रियेला दीर्घकाळ लागतो. जखम काही शतके उघडी राहते आणि तिथून बुरशी आत शिरून लाकडापर्यंत पोचते.खोड कुजून अशक्त होतं.आणि याच कारणासाठी झाडांच्या शिष्टाचाराच्या नियमावलीत खालच्या भागात फक्त छोट्या फांद्या असाव्यात असं फर्मान असतं.झाड वाढताना ही खालची फांदी जर तुटून गेली तर तिथे पुन्हा नवीन फांदी येऊ द्यायची नसते. पण काही झाडं नेमके हेच करतात.

शेजारचा एखादा वृक्ष मेला आणि सूर्यप्रकाश पोचू लागला की,काही झाडं खोडाच्या खालच्या भागातही कोंब वाढवू लागतात.या फांद्या जाड झाल्या की सुरुवातीला फायदेशीर ठरतात,कारण झाडाला आता वरच्या आणि खालच्या दोन्ही भागातून प्रकाश संश्लेषण करता येणं शक्य असतं.पण एके दिवशी,सुमारे वीस एक वर्षानंतर इतर झाडं आपला डेरा इतका वाढवितात की सूर्यप्रकाश पडणारी फट बंद होऊन जाते.आता पुन्हा खालच्या भागात अंधार पडतो आणि खालच्या जाड फांद्या मरून जातात.अशा प्रकारे आपल्या हव्यासाचा परिणाम झाडाला भोगावा लागतो.पुढच्या वेळेस तुम्ही जंगलात गेला आणि एखाद्या झाडाने अशा प्रकारची वाढ केली असेल तर त्यातून त्याचे चारित्र्य दिसून येईल.झाडाचा हा स्वतःचा निर्णय असतो,याचा अनुभव तुम्हाला येईल.जंगलाच्या उघड्या भागात वाढणाऱ्या झाडांकडे जरूर पहा.त्या सर्वांना असे बेपर्वा कृत्य करण्याचा मोह होतो,पण काही थोडेच जण तसे करतात.आणि इतर झाडं मात्र आपलं खोड नितळ ठेवून सुरक्षित राहतात.

समाप्त…!!