* विजय गायकवाड | Vijay Gaikawad

live

नमस्कार आपले स्वागत आहे. मी पुस्तके आणि मित्रांवर पैसे खर्च करतो,माझ्याकडे दगड आणि विटांवर खर्च करण्यासाठी पैसे नाहीत.- रस्किन बाँड.ही थोर माणसं व त्यांचे विचार मला पुस्तकात भेटलीत.ती भेटली आणि त्यांनी सांगितले कि, प्रत्येक दिवशी असं काही तरी करा की,ते तुम्हाला अधिक सुंदर उद्याच्या दिशेने खूप लांबवर घेऊन जाईल."- डोग फायरबाऊ.' सर्वियन कादंबरीकार मिलोराद पावीच यांचे एक वाक्य आहे ते म्हणतात - जोवर जगात पुस्तक वाचणाऱ्या वाचकांची संख्या बंदूकधारी सैनिका पेक्षा अधिक आहे तोवर काळजीच काहीच कारण नाही.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात.पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये.म्हणून अविरतपणे प्रयत्न करणारे मार्गदर्शक, मित्र धावून येतात.प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,डॉ.दीपक शेटे,आ.भरत बुटाले,प्रा.सर्जेराव राऊत,सुभाष ढगे,अनिल फारणे,डॉ.सुधीर सरवदे ,विश्वास खाडे, विनायक पाटील,संजय कुंभार,सतीश खाडे,मनोहर सुर्वे,गणेश खंदारे,तात्या गाडेकर, दादासाहेब गाडेकर, दादासाहेब ताजणे, पुस्तकातील घटना प्रसंग सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील यांनी केलेले आहे. मला लिहिण्याची प्रेरणा देणारी पुस्तके,लेखक,प्रकाशक,मित्र ही जगावेगळी माणसं माझ्या जीवनातील महत्वाचा टप्पा आहेत.... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ.मेघा गायकवाड, चिरंजीव मयान,माझ्या धावण्यातील गुरुवर्य नामदेव बरुरे,लुल्ला शेख मोठी ताई ,लहान ताई जयश्री शिंदे या सर्वांचेच मनापासून आभार व धन्यवाद मॅट्रिक फेल विजय गायकवाड

१२/३/२६

निर्जन वाळवंटात अस्तित्वाची लढाई / The battle for survival in the desert

रिकी मेगी वाळवंटातल्या नरकवासातून परतल्यावर ऑस्ट्रेलियात बराच गदारोळ झाला.त्याची हकीगत खरी की खोटी यावर वर्तमानपत्रांत चर्चा झडल्या.अशाच एका वर्तमानपत्रातील पत्रकार ग्रेग मॅक्लीन याने रिकीच्या सविस्तर मुलाखती घेऊन हे 'लेफ्ट फॉर डेड इन द आऊटबैंक' हे पुस्तक आकारालं आणलं.


अतिशय कमी झाला होता.त्यातच उन्हाचा तडाखा आता आधीपेक्षाही वाढलेला असतो.संध्याकाळी ऊन उतरल्यावर तो सलग एखादा किलोमीटर चालू शकत असतो पण दिवसा मात्र शंभर-दोनशे मीटर चालल्यावरही त्याला दम लागू लागतो.त्यात आपण कुठे चाललो आहोत याची कल्पना नसल्यामुळे ही पायपीट आणखीच अंगावर येत असते.तहानेने जीव जातो की काय अशी परिस्थिती तयार होते.आपण वेड्यासारखे पाणी सोडून आलो याबद्दल रिकी स्वतःलाच शिव्या देतो;पण दोन दिवस त्या स्थितीत काढल्यावर पुन्हा एकदा त्याला झाडांची गच्च दाटी लागते आणि त्यापल्याड आणखी एक पाणथळ रिकीची वाट पाहत असते.हाही बंधाराच असतो,पण आधीच्या बंधाऱ्यापेक्षा किती तरी मोठा.आता या बंधाऱ्यापाशी तरी माणसं असलीच पाहिजेत;अन्यथा,कोण कशाला एवढा बंधारा बांघेल,असा विचार करत रिकी स्वतःला पाण्यापाशी झोकून देतो.


थोड्याच वेळात या नव्या बंधाऱ्याच्या भोवतीही रिकीचं विश्व उभं राहू लागतं.तहान-भुकेची व्यवस्था लागल्यावर तो पुन्हा एकदा राहण्यासाठी नवं खोपटं बांधण्याच्या मागे लागतो.या वेळी त्याचं नशीब जोरावर असतं.त्या कुरणावर त्याला गाई-म्हशींना खाद्य द्यायला वापरलं जाणारं मोठं लोखंडी पिंप सापडतं.जमिनीत खड्डा करून त्यात ते पिंप आडवं घट्ट बसवल्यावर रिकीचं घर तयार होतं.शिवाय डास आणि पाऊस आत येऊ नये म्हणून नाना आयडिया लढवून तो ते घर फुलप्रूफ बनवतो.आणि सुरू होतो संघर्षाचा नवा टप्पा.


या घरामुळे लवकरच रिकीला आणखी एक शोध लागतो.त्या घरात फांद्यांची जाडजूड बिछायत घातली नाही तर उन्हामुळे तापलेल्या पत्र्यामुळे रिकीचं बूड शेकून निघत असतं.त्यावरून त्याला आपलं खाणं या पत्र्यावर ठेवून भाजून घेण्याची कल्पना सुचते.मग तर काय,आता खरंखुरं जेवण जेवल्याचा आनंद त्याला मिळू लागतो.या नव्या जागी रिकीच्या खाद्यपदार्थांमध्येही बरीच वाढ होते.नवे किडे,नव्या प्रकारच्या अळ्या,बेडकांच्या किती तरी जाती आणि पाली असा खुराक सुरू होतो.असेच दिवस जात राहतात.रिकीच्या घराच्या आसपास कुणीही फिरकत नाही.या वाळवंटात भरकटून त्याला आता दीड महिना उलटून गेलेला असतो.आपण आता कायमचे इथेच मुक्कामी असणार की काय असं रिकीला वाटू लागतं. दोन-तीन वेळा एक छोटं विमान त्याच्या डोक्यावरून अगदी जवळून उडत जातं.रिकीला वाटतं,पायलट आपल्याकडे पाहतो आहे;पण प्रत्यक्षात पुढे काहीच घडत नाही.

खाणं-पिणं,खोपटं आणखी सोईचं बनवण्यासाठी दिवसभर काहीबाही करत राहणं आणि उरलेला वेळ पाण्याकाठी किंवा खोपटात बसून विचार करत राहणं एवढंच रिकीच्या हातात असतं. आणखी एक काम त्याला सतत व्यापून असतं.वेळ मिळेल तेव्हा तो आग पेटवण्याचा प्रयत्न करून पाहत असतो.कधी दगड एकमेकांवर घासून,तर कधी लाकडं, तर कधी सूर्याच्या उष्णतेचा उपयोग करून.पण त्यात मात्र रिकीला काही केल्या यश मिळत नाही.त्या काळात त्याच्या मनात काय काय चालू राहतं.

आजवरच्या आयुष्यात घडून गेलेलं सारं पुन्हा अनुभवल्यासारखं समोर येतं.बालपणीच्या आठवणी,आई-वडील, बहिणी, मित्र-मैत्रिणी,आनंदाचे दिवस,केलेल्या चुका.. असं बरंच काही मनाशी घोळवत तो आला दिवस काढत असतो. अनेकदा त्याच्या मनात लिफ्टच्या बहाण्याने त्याला लुबाडणाऱ्या आणि इथे वाळवंटात आणून सोडणाऱ्या चोरट्यांचाही विचार येत असतो.तो विचार आला की त्याचं शरीर तापायला लागत असतं.इथून सुटलो की त्या लोकांना शोधून काढायचंच,असं तो स्वतःला बजावत असतो.पण आता त्याचा सगळा प्रयत्न सुटकेसाठी नव्हे,तर केवळ जिवंत राहण्यासाठी असतो. आरसा नसला तरी अनेकदा बंधाऱ्याच्या नितळ पाण्यात डोकावून बघताना त्याला स्वतःचं झपाट्याने खंगत चाललेलं शरीर दिसत असतं.उठता-बसता त्याला स्वतःचीच हाडं टोचू लागलेली असतात.शंभर किलोचा दणकट रिकी आता एक सांगडा बनून राहिलेला असतो.


काही दिवसांनी रिकीला एक मित्र मिळतो.ते एक वाळवंटी कुत्रं असतं.एक डोळा फुटलेलं कुत्रं.लवकरच रिकी त्या कुत्र्याशी गप्पा मारायला सुरुवात करतो. इतके दिवस ज्या गोष्टी तो स्वतःशी आणि त्या काठीशी बोलत असतो त्या सांगायला एक जिवंत प्राणी मिळतो.काही दिवसांनी पुन्हा दिवस पालटतात.पाऊस थांबतो आणि रिकीच्या अन्न-पाण्याचा साठा हळूहळू कमी होऊ लागतो. पाणी आणि प्राणी आणखी बरेच दिवस पुरतील अशी रिकीची खात्री असते;पण ते संपल्यावर काय,हा विचार त्याला अस्वस्थ करत असतो.त्याला मनातून जाणवू लागलेलं असतं,की आता यापुढे नव्याने मोहीम सुरू करण्याची शक्ती आपल्यात राहिलेली नाही. त्यामुळे तो अन्न आणि पाणी दोन्हीही जपून वापरायला सुरुवात करतो.मध्येच एकदा त्याच्या परिसरात काही छोटे इमू न जाणे कुठून पाण्याच्या शोधात भरकटत येतात.त्यांच्याकडे पाहिल्यावर रिकीचे डोळे चमकतात. एखाद्या इमूला जरी आपण मारू शकलो तर.. पण हे काम कोणत्या हत्याराने तडीस नेता येईल याचा विचार करेपर्यंत ते इमू सुसाट वेगाने आले तसे गायब होतात. एकदा एक कांगारूही त्याच्या जवळ येतो;


पण तोही हुलकावणी देऊन पळ काढतो.अर्थात,एवढे मोठे प्राणी मारण्याची ताकद आपल्यात राहिलेली नाही,हेही रिकीला मनातून माहिती असतंच.एकेक करून प्राणी संपत जातात.आसपासची हिरवळ आणि पाणीदार फुलंही खाऊन संपू लागतात.एवढंच काय,बंधाऱ्यातलं पाणीही कमी होत शेवाळ्याने भरलेल्या डबक्याचं रूप घेतं.एकाक्ष कुत्रा अजूनही रिकीच्या मागे मागे फिरत असतो.हा खरोखर आपल्याला मित्र मानतोय की आपण मरण्याची वाट बघतोय हे रिकीला कळेनासं होतं.कधी कधी त्याचीही मती फिरते.त्याला वाटतं,


आपल्याजवळच्या लोखंडी सळीने या कुत्र्याला मारावं आणि त्याला खावं;पण मित्र मानलेल्या कुत्र्याला मारायला काही केल्या रिकीचं मन धजत नाही.आणि एके दिवशी अचानक तो कुत्रा गायब होतो.त्याला कुणी मारलं की तो आपोआप मेला,की फक्त दुसरीकडे कुठे तरी भरकटत गेला ते रिकीला कळू शकत नाही.त्याच्या एकुलत्या एक सोबत्यानेही त्याची साथ सोडलेली असते.


आता आपली सुटका होईल का,हा विचार मनात आणणंही रिकीला नकोसं वाटतं.त्या विचाराने त्याचं आधीच निराश झालेलं मन आणखी गटांगळ्या खाऊ लागतं.एके सकाळी त्याला जाग येते तेव्हा कुत्र्यांच्या गुरगुरण्याचा आवाज ऐकू येतो.पाहतो तर चार-पाच दांडगट वाळवंटी कुत्रे त्याच्या खोपटाभोवती घिरट्या घालत असतात.गिधाडाने मरणाऱ्या प्राण्याची आशाळभूतपणे वाट पाहावी तसंच ते दृश्य असतं.हे आपलं घर नसून आपलं थडगं आहे,असं रिकी स्वतःशीच खूपदा म्हणत राहतो.त्या कुत्र्यांमुळे त्याचं खोपटातून बाहेर पडणं जवळपास बंद होऊन जातं.ते आसपास नाहीत असं बघून जवळचंच गवत तोंडात कोंबून आणि शेवाळलेलं पाणी पिऊन रिकी खोपटात पडून राहू लागतो.

आपल्यात आणि जंगलातल्या प्राण्यांमध्ये काहीच फरक नाही असं त्याला वाटू लागतं. त्या प्राण्यांना किमान त्रासाची जाणीव तरी नसते. आपलीही आता या त्रासातून सुटका झाली तर बरं, असा विचार त्याच्या मनात येऊ लागतो.आता मृत्यू सोडून आणखी काय वाईट घडू शकणार,असं वाटत असतानाच त्याला पुढचा फटका बसतो.


एके दिवशी रिकी उठतो तेव्हा त्याच्या चेहऱ्याची डावी बाजू सुजून ठणकत असते.रात्रीतून एखादा विषारी किडा आपल्याला चावला असावा असा अंदाज तो बांधतो.थोड्याच वेळात ते विष त्याच्या डाव्या हाताकडे पसरतं.आता आपण झोपून राहिलो तर कधी तरी ग्लानीतच आपल्याला मृत्यू येईल असं वाटून रिकी पडून राहतो;

पण किती तरी तास उलटतात,तरी ना मृत्यू येतो ना वेदना कमी होतात.आता तर त्याचा जबडा जवळपास बंद होतो.हाताने जोर धरून तो उचकटूनच त्याला तोंडात गवत कोंबावं लागत असतं.

गवत आत गेल्यावर तर मरणाच्या कळा सुरू होत असतात. त्याच्या लक्षात येतं,की आपल्याला विषारी किडा चावलेला नसून वेदना किडलेल्या दाढेमुळे होताहेत. खूप धीर एकवटून तो तोंडात बोट घालून खरोखरच कोणती दाढ दुखते आहे ते तपासतो.त्याचा अंदाज खरा असतो.ती दाढ काढून टाकली नाही तर काहीही खाणं अशक्य होऊन आपण मरणार हे त्याला कळून चुकतं. पण तसेही आपण कुठे जिवंत राहणार आहोत ? मग हातात काहीही साधन नसताना एवढी अघोरी शस्त्रक्रिया कशाला करायची,या उलटसुलट विचारांमध्ये आणखी दोन दिवस जातात.आता मात्र त्याला वेदना इतक्या असह्य होतात की आपल्या कारची किल्ली तोंडात घालून ती दाढ उपटण्याचा प्रयत्न तो सुरू करतो.सोबतीला वाकवता येतील अशा छोट्या ताराही असतात.आपण किती वेदना सहन करू शकतो हे आजवर आपल्याला माहितीच नव्हतं,असं रिकीला वाटून जातं.बऱ्याच प्रयत्नांनंतर आणि असह्य छळ सहन केल्यानंतर कित्येक किलोमीटरपर्यंत ऐकू जाईल एवढ्या किंकाळ्या फोडत तो दात उपटून काढण्यात रिकी यशस्वी होतो.


ही शस्त्रक्रिया झाल्यावरही किती तरी वेळ रिकीला काहीही तोंडात घालता येत नाही की उठून पाण्यापर्यंत जाता येत नाही.त्या खोपटात चार-पाच दिवस अडकून पडल्यानंतर रिकीला वाटतं,

आता पुन्हा एकदा बाहेर पडण्याचा प्रयत्न करायला हवा;पण त्याचे पाय एखाद्या जेलीसारखे निर्जीव झालेले असतात तो पायांवर उभाच राहू शकत नाही. कसा तरी लोळण घेत तो बंधाऱ्यातल्या पाण्यापर्यंत पोहोचतो.पुन्हा तसाच खोपटापर्यंत लोळत येतो. तिथेच पडून राहतो - मृत्यूची वाट बघत.त्यानंतर काहीच दिवसांत..अचानक रिकीला कारचा आवाज ऐकू येतो पण हा नक्कीच वाऱ्याचा आवाज असणार असं समजून तो त्याकडे दुर्लक्ष करतो. आपल्याला भास होणंही अवघड नाही हेही त्याला माहिती असतंच.पण थोड्याच वेळात त्याला गिअर बदलण्याचाही आवाज येतो.वारा काही गिअर बदलत नाही,असं म्हणत तो आपल्या खोपटातून बाहेर डोकावतो,तर काही अंतरावर खरोखरच एक गाडी उभी असते.त्यातली दोन माणसं कुतूहलाने रिकीच्या खोपटाकडेच पाहत असतात.रिकीचा आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसत नाही.तो जोरजोराने त्यांच्याकडे बघून हात हलवू लागतो,खोपटातून बाहेर येण्यासाठी धडपडतो.

खोपटात कोणी तरी असल्याचं पाहून त्या माणसांचा हात नकळत आपल्या बंदुकीवर जातो;पण तेवढ्यात रिकी उठून उभा राहण्यात यशस्वी होतो आणि हा माणूस असल्याचं त्यांना कळतं.तब्बल ७१ दिवस मृत्यूच्या दाढेत वावरल्यानंतर रिकी मेगीसाठी पुन्हा एकदा जीवनाचे दरवाजे उघडलेले असतात.


●●● समाप्त ●●●



१०/३/२६

निर्जन वाळवंटात अस्तित्वाची लढाई / The battle for survival in the desert

रिकीच्या पोटातली भुकेची भावना वाढीस लागते. 


सुरुवातीला 'सुटका व्हावी' या एकाच विचाराने त्याचं मन आक्रंदत असतं.मग त्याची जागा तहान घेते.आता नदीशेजारी राहून तहान भागल्यानंतर त्याचं पोट त्याला ओरडून भुकेची जाणीव करून देऊ लागतं;पण अजूनही ज्याने पोट भरेल असं काहीही त्याच्या नजरेच्या टप्प्यात येत नाही.मात्र,


अजूनही 'आपली सुटका होणार नाही' किंवा 'आपण आता मरू' या विचाराने रिकीच्या मनाला स्पर्शही केलेला नसतो. आज ना उद्या आपली सुटका होणार याची त्याला खात्री असते.


नदीच्या किनाऱ्याजवळून किंवा पात्रातून चालता चालता एके ठिकाणी त्याला एक पायवाट आतल्या बाजूला गेलेली दिसते.

आता त्याच्यापुढे प्रश्न उभा राहतो.या पायवाटेने गेलं तर कदाचित एखाद्या जाग असलेल्या शेतावर किंवा वस्तीवर आपण पोहोचू शकू. पण तसं करताना नदीची साथ सोडावी लागणार.पुढे गेल्यावर पाणी आणि खायला गवत मिळालं नाही तर काय करायचं ? बराच वेळ स्वतःशी वाद घालत तो त्या पायवाटेवरून जाऊन बघायचं ठरवतो.सुटका करून घ्यायची असेल तर आपल्यालाच हात-पाय मारावे लागतील,असं स्वतःला बजावतो.

पायवाटेवरून आत जमीन हळूहळू कोरडी होत जाते.अधूनमधून काही डबकी लागतात,पण थोड्या वेळाने तीही कमी होत जातात.

ऊन मी म्हणू लागतं.आपण नदी सोडून कुठून या दिशेला आलो,

असं रिकीला होऊन जातं.शिवाय,त्या पायवाटेने रिकीला अजून तरी कोणत्याही मानवी खाणाखुणांपर्यंत आणून पोहोचवलेलं नसतं.आता पुढे चालत राहावं की परत नदीपाशी जावं,असा विचार करत असताना वाट आणखी मोठी होते,झाडांची संख्या वाढते आणि थोड्याच वेळात रिकी एका प्रॉपर्टीपाशी येऊन थडकतो.तिथे कुंपण घातलेलं असतं आणि एक मोठ्या आकाराचा साइनबोर्डही.त्यावर लिहिलेलं असतं, हेट्सबरी बीफ कंट्री! ही जागा कुणाच्या तरी मालकीची आहे आणि आपण तिथे पोचलेलो आहोत ही गोष्टही रिकीला जवळपास सुटका झाल्याचा आनंद देते.


त्या रानात काही गाई आणि त्यांची वासरं फिरत असतात.भरपूर बीफ रिकीच्या टप्प्यात असतं,आतडी पिळवटून निघालेली असतात;पण गाय मारून खाण्याचा विचार तो फारसा गांभीर्याने करत नाही.एक तर आता आपली सुटका होणार असं त्याला वाटत असतं.दुसरं,हातात कुठलंच हत्यार नसताना गाईला मारणार कसं, हाही प्रश्न असतोच.नदी सोडल्यापासून न थांबता चालल्यामुळे रिकीचे पाय पुन्हा एकदा रक्तबंबाळ झालेले असतात.एका जागी शांतपणे बसून तो आधी पायांकडे लक्ष देतो.आता यापुढे या पायांनी चालणं म्हणजे थेट मांसाचे तुकडे जमिनीवर टेकवणं, तो सरळ आपला टी-शर्ट फाडतो आणि त्याचे तुकडे पावलांना गुंडाळतो.त्याने त्याच्या पायांच्या वेदना काहीशा कमी होतात एवढंच काय ते.चालायला मदत म्हणून रिकी एक चांगली काठीही पैदा करतो. त्याशिवाय चालणं आता जवळपास अशक्य झालेलं असतं.लवकरच ती काठी बहुपयोगी असल्याचं रिकीच्या लक्षात येतं.त्या काठीने तो खोदू शकत असतो.एखाद्या झाडावर काठी अडकवून त्यावर फाटक्या शर्टचं कापड टाकलं की उन्हापासून संरक्षण होतं असतं.सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रिकीला एक साथीदार मिळतो.त्याच्या जीवघेण्या एकटेपणापासून थोडीशी सुटका.स्वतःशी बोलून वैतागल्यामुळे तो या निर्जीव काठीशी गप्पा मारायला लागतो.काही काळातच ती काठी त्याच्यासाठी इतकी जिवलग बनते की ती आसपास नसेल तर तो अस्वस्थ होऊ लागतो.रात्रीच्या मुक्कामातही ती काठी कायम हाताशी असेल याची काळजी घेऊन झोपायची सवय त्याला लागते.


नदी सोडून दोन दिवस उलटून जातात.कुठे तरी डबक्यात साचलेलं चिखलाचं पाणी सोडलं तर त्याला प्यायला काहीही मिळालेलं नसतं.तहान असह्य होऊन तो एके ठिकाणी अंग टाकतो आणि देवाला म्हणतो,की आता पाऊस पाड.त्याशिवाय मी पुढे चालू शकत नाही. योगायोग असा,की खरोखरच तासाभरात आभाळ भरून येतं आणि पाऊस कोसळू लागतो.पोटभर पाणी पिऊन रिकी पुन्हा चालू लागतो.ही पायवाट आपल्याला माणसांपर्यंत घेऊन जाईल,ही त्याची आशा अजून तरी फोलच ठरलेली असते.ही वाट बहुतेक मला माझ्या थडग्याकडेच घेऊन चालली असावी,असे विचारही त्याच्या मनात घोळू लागलेले असतात.

तेव्हाच त्याला रस्त्यावर दोन बाजूंना दोन बाण असलेल्या पाट्या दिसतात.त्यातल्या कुठल्या रस्त्याने गेलं की एखादं घर असेल ? आपण नेमके त्याच्या विरुद्ध रस्त्याने गेलो तर काय? असे अनेक प्रश्न रिकीला पडतात.त्यामुळे तो दोन्हीकडे थोडं थोडं अंतर जाऊन बघायचं ठरवतो. एका रस्त्याने बरंच अंतर चालल्यावरही त्याला मनुष्यवस्तीच्या काहीच खाणाखुणा दिसत नाहीत.ना तिकडे पाणी असतं,ना खाता येईल असं गवत,ना आणखी काही.तिकडे रिकीला फक्त मोठाले दगड दिसतात.ते पाहून त्याला सुचतं,की ते एकत्र मांडून SOS चं चिन्ह काढता येईल,जेणेकरून आकाशातून जाणाऱ्या विमानांना ते दिसेल.अर्धा दिवस त्या प्रयत्नात घालवल्यानंतर तो पुन्हा दोन रस्ते फुटलेल्या जागेकडे चालू लागतो.संध्याकाळ झालेली असते आणि भुकेने रिकी इतका कासावीस झालेला असतो की न राहवून तो एका झाडावर बसलेल्या अळ्यांचा शोध घेऊ लागतो.


एका झुडपावर त्याला तशा अळ्या सापडतात.त्या खात असतानाच अचानक त्याच्या हाताला काही तरी जोरात चावतं.

पाहतो तो एक मोठा किडा त्याच्या हातावर बसलेला असतो.

त्याला इतक्या जोराने वेदना होतात की तो हात धरून जोरजोरात ओरडतो.त्या नादात आपण रस्ता सोडून आतल्या बाजूला भरकटलो आहोत याचं त्याला भान राहत नाही.थोड्या वेळाने त्याचं बोट,हात आणि नंतर चेहऱ्याची एक बाजूही सुजू लागते.

त्यातच अंधार पडतो आणि आपण रात्रीच्या मुक्कामासाठी जागाही न शोधता वेड्यासारखे इकडे-तिकडे फिरत ठेचकाळतो आहोत,या विचाराने रिकी आणखी घाबराघुबरा होतो.तो वेड्यासारखा रस्ता शोधत पळू लागतो.पहिल्यांदाच लक्कन त्याच्या मनात विचार येतो, की बहुतेक आपण या माळरानावरच मरून जाणार. आपलं काय झालं,आपण किती चाललो,किती सहन केलं,कुठे मेलो हे जगात कुणालाही कधीही कळणार नाही.इथेच कुठे तरी आपलं शरीर पडणार आणि जंगली कुत्री त्याची विल्हेवाट लावणार.हा विचार करतच तो रात्री तिथल्याच कुठल्या तरी झुडपाखाली कोसळतो.


पण पहाट पावसाची भुरभुर घेऊन येते.आपण रात्रीतून मेलो नाही.आपण जिवंत आहोत.एवढंच नव्हे,तर आपल्या तहानलेल्या जीवासाठी पाऊस पडतो आहे... रिकी नव्या उत्साहाने रस्ता शोधत चालू लागतो. भुकेमुळे समोर दिसणारं गवत,फुलं - जे शक्य असेल ते तो तोंडात टाकून बघत असतो.अखेर थोड्या वेळाने तो पुन्हा त्या पाट्यांपाशी येऊन ठेपतो आणि उलट दिशेने जाऊ लागतो.या सगळ्या गोंधळातही त्याने आपली काठी जिवापाड जपून ठेवलेली असते.


तिच्या साथीने पाय ओढत तो दिवसभर चालतो. रात्रीच्या सुमारास एका गवताळ,ओल्या भागापाशी येऊन पोहोचल्यावर तिथेच अंग टाकून झोपी जातो. डास आणि पिसवांनी त्याचा पिच्छा सोडलेला नसतो; पण त्यांना टाळणं अशक्य आहे हे मान्य करून त्याने त्या त्रासाचा विचार करणं सोडून दिलेलं असतं.


आता या वाळवंटात येऊन त्याला दोन आठवडे होऊन गेलेले असतात.आता यापेक्षा अधिक त्रास सहन करणं अशक्य आहे असं रिकीला वाटतं.आता काहीही करून आपली सुटका झालीच पाहिजे,असं तो स्वतःला बजावत असतो;पण त्याला कल्पना नसते की अजून बराच त्रास सहन करणं बाकी आहे.


एकदा थोडी हिरवळ आणि ओलावा असलेली जागा पकडून तो तिथे स्वतःसाठी आसरा तयार करायचं ठरवतो.पुढे चालायचं असेल तर दोन दिवस विश्रांती घेणं भाग असतं.काठीच्या आणि दगडांच्या मदतीने स्वतःला झोपता येईल एवढी जमीन उकरून तो त्यावरून पांघरण्यासाठी गवत आणि झाडांच्या फांद्या तोडून काढतो.तिथेच त्याला कित्येक दिवसांतला पहिला मांसाचा पहिला तुकडा खायला मिळतो.ती एक पाल असते.ती विषारी आहे की नाही,किंवा त्यातून असं कितीसं अन्न पोटात जाणार आहे याचा विचार न करता तो पटकन ती खाऊन टाकतो.तोवर त्याच्या शरीरातल्या भुकेच्या भावनेने राक्षसी रूप धारण केलेलं असतं. त्यामुळे पाल खाण्यात काही घृणास्पद आहे असं त्याला अजिबात वाटत नाही.आणखी दोन दिवसांच्या पायपिटीनंतर पुन्हा एकदा त्याला पाण्याची चाहूल लागते.हिरवाई वाढलेली असते. बेडूक आणि पालींसारखे प्राणी दिसू लागतात. जमिनीतली ओल वाढते.आणि एके दिवशी अचानक तो एका छोट्या बंधाऱ्याशी येऊन थांबतो.त्या बंधाऱ्यात भरपूर पाणी भरलेलं असतं.रिकी शांतपणे त्या पाण्यात शिरतो.पाण्यात पडून शरीराचा शीण कमी करण्याचा प्रयत्न करतो.या पाण्याच्या किनाऱ्यावर एक छोटंसं खोपटं बांधायचं,असा विचार करत तिथेच पडून राहतो. पाण्याजवळ राहायचं तर डासांपासून जीव वाचवण्यासाठी आसऱ्याची गरज असतेच.आजूबाजूच्या काटक्या,फांद्या आणि चिखल यांपासून तो आसरा बनवायला सुरुवात करतो.दिवसभर करायला दुसरं काहीच नसल्यामुळे त्यात मन गुंतून राहणं हाही फायदा असतोच.आसपास त्याला आणखी काही बांधकामाचं साहित्य दिसतं.त्यातून एक तात्पुरता आसरा तयार होतो.


रिकीला जग जिंकल्याचा आनंद मिळतो.रात्री झोपायला एक ठिकाण,सकाळी उठून बंधाऱ्यात पोहायचं,पोटाला तडस लागेपर्यंत पाणी प्यायचं,खाण्यासाठी पाली किंवा बेडूक पकडायचे,पुन्हा रात्री आसऱ्याला यायचं.थोड्याच दिवसांत रिकीच्या मेन्यूमध्ये आणखी काही पदार्थांची भर पडते - खेकडे आणि जळवा! सुरुवातीला जळू खावी की नाही याबाबत रिकी द्विधा असतो;पण एक जळू टपकवल्यावर (आणि आसपास असणारं जळवांचं प्रमाण पाहता) लवकरच तो त्याचा आवडता पदार्थ बनतो.


या डॅमवर रिकीचं एकुणात बरं चाललेलं असतं. डास-पिसवा आणि जोराचा पाऊस आला की गळणारं खोपटं सोडलं तर तसा फारसा त्रास नसतो;पण रिकीची तब्येत सुधारण्याएवढं खाणं त्याला कधीच मिळत नाही. त्यातच काही दिवसांनी पाऊस थांबतो.बंधाऱ्यातलं पाणी कमी होऊ लागतं आणि त्याबरोबर आसपासचे प्राणी,म्हणजे रिकीचं खाद्यही.शिवाय,बंधाऱ्याशी पाण्याजवळ थांबावं की सुटकेच्या आशेने चालत राहावं,हा यक्षप्रश्न नेहमीप्रमाणे रिकीपुढे उभा असतोच. इथे पाणी आणि थोडं अन्न असलं तरी जगाशी संबंध नसलेल्या या वाळवंटात किती दिवस खितपत पडणार? इथून थोडं पुढे गेल्यावर एखादी वस्ती असेल तर ? पण सोबत पाणी घेऊन जायला काहीही नसताना हे सुख सोडून जाणं बरोबर आहे का? अनेक उलटसुलट विचार त्याच्या मनात घोंघावत असतात.जणू एका माणसामध्ये तो चार-पाच माणसं वागवत असतो.


पण हळूहळू पाणी संपू लागल्यावर त्याला मुक्काम हलवण्याचा निर्णय घ्यावाच लागतो.स्वतः तयार केलेलं छोटंसं जग मागे ठेवून तो चालू लागतो.चालणं सुरू केल्यावर त्याला जाणवतं,की मध्ये पायांना विश्रांती मिळाली असली आणि थोडंफार खायलाही मिळालं असलं तरी आपली शक्ती आता कमी कमी होत चालली आहे.रिकीचं वजन तर प्रचंड उतरलेलं होतंच,पण त्याचा दमसासही अतिशय कमी झाला होता.


★★★ अपूर्ण ★★★


८/३/२६

निर्जन वाळवंटात अस्तित्वाची लढाई / The battle for survival in the desert

नवी नोकरी सुरू होण्याआधी सुट्टीवर निघालेला रिकी मेगी हायवेवर अनोळखी व्यक्तीला लिफ्ट देण्याची चूक करतो आणि जिवावरच्या संकटात सापडतो- आऊटबॅक,म्हणजे ऑस्ट्रेलियाच्या विस्तीर्ण आणि निर्जन वाळवंटात मरण्यासाठी सोडून दिलेल्या रिकीची अस्तित्वासाठी दिलेली लढाई.( रिकी मेगी,निर्जन वाळवंटात अस्तित्वाची लढाई,मृत्यू पाहिलेली माणसं,गौरी कानिटकर, समकालीन प्रकाशन )


▶ शुद्धीवर आल्यानंतर रिकीच्या लक्षात येतं की आपण एका खड्ड्यात गाडले गेलो आहोत.आपल्यावर माती आणि ताडपत्री टाकलेली आहे.कुत्री आपलं थडगं उकरताहेत...


पस्तीस वर्षांचा रिकी अंगापिंडाने दणकट असतो.सहा फूट उंच आणि १०० किलो वजन.खड्ड्यातून बाहेर यायला त्याला वेळ लागत नाही;पण बाहेर आल्यावर दिसणारं दृश्य त्याला खचवणारं असतं.दूरवर वाळवंट पसरलेलं असतं.ना कुठे रस्ता दिसत असतो,

ना मनुष्यवस्तीच्या खाणाखुणा.आपण तर बंटिन हायवेवरून हॉल्स क्रीककडे चाललो होतो.अचानक या वाळवंटात आपण कसे काय येऊन पडलो ? त्याच्या डोक्यात सगळा गोंधळ उडतो.

हे नक्कीच एखादं स्वप्न असलं पाहिजे असं त्याला वाटतं.

अन्यथा,एवढ्या भयंकर परिस्थितीत आपण कशाला सापडू? पण नंतर मात्र नेमकं काय घडलंय ते त्याला हळूहळू आठवायला लागतं.हायवेवरून जाताना आपण लिफ्ट दिलेल्या तरुण माणसाने आणि त्याच्या साथीदारांनी आपल्याला गुंगीचं औषध पाजून इथे फेकून दिलंय हे त्याच्या लक्षात येतं.आता पुढे काय याचा विचार न सुचून तो किती तरी वेळ सुन्न बसून राहतो.


ऊन वर यायला लागतं तसा वाळवंटाचा चटका बसायला सुरुवात होते.घशाला कोरड पडते.उन्हात नुसतं बसून राहणं अशक्य असतं.पण चालायला सुरुवात करायची तर ती कोणत्या दिशेने हे रिकीला कुठे माहिती असतं?आपण नेमके कुठे आहोत आणि कुठल्या दिशेने गेल्यावर आपल्याला मदत मिळेल याची त्याला काहीच कल्पना नसते.पण आसपास कुठे तरी वस्ती तर असलीच पाहिजे असं त्याला वाटतं.जवळ नाही,तर थोडं चालल्यावर का होईना,आपल्याला मदत मिळेल आणि आपण लवकरच सुखरूप घरी पोहोचू, अशी तो स्वतःची समजूत काढतो.कुठल्या दिशेने चालावं हे ठरवण्यासाठी तो त्यातल्या त्यात उंच झाडावर चढून जवळपास रस्ता किंवा एखादी वस्ती दिसते का हे बघायचा प्रयत्न करतो;पण त्याला तशी काहीही चिन्हं दिसत नाहीत.दूरपर्यंत खुरट्या झुडपांनी व्यापलेलं सपाट वाळवंट पसरलेलं असतं. 


त्याचं मन एकाच वेळी निराशेने आणि आपल्याला अशा निर्जन वाळवंटात फेकून देणाऱ्या लोकांबद्दलच्या संतापाने भरून येतं.या लोकांनी रिकीच्या पायांतले बूटही काढून घेतलेले असतात.दोन-चार वर्षांपूर्वी झालेल्या अपघातात रिकीच्या पायावर अनेक शस्त्रक्रिया कराव्या लागलेल्या असतात.तेव्हापासून लेगब्रेस घालूनच त्याला चालावं लागत असतं.ते लेगब्रेसही त्या चोरट्यांनी लंपास केलेलं असतं.माणसं इतकी निष्ठुर कशी होऊ शकतात याचं आश्चर्य करण्यापलीकडे रिकीच्या हातात काहीही नसतं. नाइलाजाने तो चालायला सुरुवात करतो,केवळ अंदाजानेच पूर्वेची दिशा पकडून.पायांत बूट आणि लेगब्रेस नसताना तापलेल्या मातीत चालणं जीवघेणं असतं.जमिनीवरचे अणकुचीदार दगड आणि खुरटी झुडपं यामुळे लवकरच त्याच्या पायांची चाळण होते. थांबत थांबत,कधी एखादं झाड लागलं तर त्याच्या अपुऱ्या सावलीत विश्रांती घेत रिकी चालत असतो.


तास-दोन तास होत नाहीत तोपर्यंत घसा पूर्ण कोरडा पडून रिकी पाण्यासाठी कासावीस होऊ लागतो. आपल्याकडे काही म्हणजे काही नाही,अगदी पाणीदेखील नाही हे रिकीच्या तेव्हा लक्षात येतं.तब्येत दणकट असल्यामुळे एखाद-दुसरा दिवस न खाता राहता येऊ शकतं,पण पाणी न पिता कसा तग धरणार? आकाशात पाहावं तर पाऊस पडण्याची काही शक्यताही दिसत नाही.शेवटी तहान जेव्हा असह्य होते तेव्हा रिकीसमोर स्वतःची लघवी पिण्याखेरीज काहीही उपाय उरत नाही.आपल्यावर ही काय वेळ आली आहे, या विचाराने त्याला स्वतःचीच दया येते.पण लवकरच तहानेने तो इतका कासावीस होतो की घसा ओला करण्यासाठी काहीही मिळालं तरी चालेल असं त्याला वाटू लागतं.पिण्यासाठी बाटली,भांडं असं काहीच नसल्यामुळे शेवटी स्वतःच्या अंडरवेअरवर लघवी करून ती तोंडात पिळण्याची वेळ रिकीवर येते.


घसा ओला झाल्यावर पुन्हा चालायला सुरुवात होते. रिकीच्या डोक्यात विचारांचं काहूर माजलेलं असतं;पण अजूनही त्या विचारांचा सगळा भर 'आता सुटका होईल की मग' यावरच असतो.हायवेवरची आपली कार कुणाला तरी मिळेल;नव्या नोकरीत रुजू होण्याआधी आपण ज्या मैत्रिणीकडे जाणार होतो ती आपली शोधाशोध करेल,पोलिसात तक्रार दाखल करेल;

आत्तापर्यंत आपला शोध सुरूही झाला असेल. आता कुठल्याही क्षणी आपली सुटका होईल...अशा विचारांत तो चालत असतो. हे विचारच त्याला चालण्याची शक्ती देत असतात.पण लवकरच सूर्य मावळतो आणि त्याच दिवशी सुटका होण्याची आशाही. 


रात्री या उघड्या माळरानावर मुक्काम करावा लागणार हे नक्की होतं.दिवसा उन्हाचा जेवढा असह्य चटका बसत असतो तेवढीच असह्य थंडी रात्री पडते,रिकी झोपण्यासाठी झुडपांची दाटी झालेली एक जागा शोधून काढतो आणि अंगावर फांद्या ओढून बसून राहतो. थंडीत झोप येणं शक्यच नसतं.त्यातच मध्यरात्री पावसाला सुरुवात होते.रिकी आनंदाने नाचू लागतो. पोटाला तडस लागेपर्यंत तो पाणी पिऊन घेतो आणि त्या पावसातच झोपी जातो.


सकाळी उठून पुन्हा चाल सुरू होते.पाऊस थांबलेला असतो आणि पावसाचं पाणी रिचवून ती रेताड जमीन पुन्हा कोरडीठक्क पडलेली असते.काही छोट्या डबक्यांमध्ये पाणी साठलेलं रिकीला दिसतं.त्यात तोंड घालून तो शक्य तेवढं पाणी पितो;पण जसजसं ऊन वाढतं,चालून चालून दमणूक होते तसतशी पाण्याची गरज वाढू लागते.घसा ओला करण्यासाठी त्याला पुन्हा कालचाच उपाय अवलंबण्याची वेळ येते.चालून चालून पाय रक्तबंबाळ झालेले असतात.दुसरा दिवसही संपत येतो;पण ना कोणी त्याची सुटका करायला येतं, ना त्याच्या नजरेच्या टप्प्यात एखादी वस्ती दिसते.दुसऱ्या दिवशी रात्री झोपण्यासाठी रिकी थोडे अधिक कष्ट घेऊन फांद्यांचं छत असलेला एक आडोसा तयार करतो.त्याही रात्री मुसळधार पाऊस पडतो आणि वाहून जातो.एवढा पाऊस पडूनही आपल्याकडे पाणी साठवायला काही नाही याचं रिकीला किती वाईट वाटत असेल याची कल्पनाच केलेली बरी.


तिसऱ्या दिवशी सकाळी चालणं सुरू केल्यानंतर रिकीला एक छोटासा चढ लागतो.त्यावर चढून चारही दिशांना वस्तीची किंवा रस्त्याची काही खूण दिसते का हे बघण्यात तो बराच वेळ घालवतो;पण व्यर्थ.पुढचा अर्धा दिवस वाटेमध्ये त्याला छोटी डबकी लागतात.ती चिखलाने भरलेली असली तरी त्यांत पाणीही असतं हे काही कमी नव्हे ! त्यामुळे प्रत्येक डबक्यातलं जमेल तेवढं पाणी पिऊन रिकी मार्गक्रमण करत राहतो.पहिले काही दिवस असेच जातात.दिवसभर मोडक्या पायांनी तंगडतोड करायची,रात्री झोपण्यासाठी चांगला आसरा तयार करायचा,रात्री पाऊस पडला की भरपेट पाणी पिऊन घ्यायचं आणि सकाळी पुन्हा चालायला सुरुवात करायची.त्या काळात रिकीच्या मनात पहिल्यांदा देवाचे विचार येऊ लागतात.रिकीचा देवावर विश्वास असतो, पण त्याचा विचार करण्याची वेळ आजवर त्याच्यावर कधीच आलेली नसते.या वेळी पहिल्यांदाच त्याच्या मनात प्रश्न उमटू लागतात... देव म्हणजे नेमकं काय,तो खरंच आपल्या आसपास आहे का,मी आता कोणत्या संकटातून चाललो आहे हे त्याला कळत असेल का, हे प्रश्न त्याला स्वतःच्या दयनीय परिस्थितीपासून लक्ष विचलित करण्यासाठी उपयोगी पडतात.


चौथ्या पाचव्या दिवशी रिकीची शक्ती कमी होऊ लागते. दुपारी उन्हाचा तडाखा सर्वाधिक असताना त्याचे पाय डगमगायला सुरुवात होते.अनेकदा डोळ्यांसमोर अंधारी येऊन आपण पडतो की काय असं त्याला वाटत असतं; पण तो स्वतःला सावरत,

विश्रांती घेत पुन्हा पुढे चालत स्वतःला खेचत असतो.एकदा मात्र त्याच्या शरीरातले त्राण संपतात आणि तो त्या तापलेल्या मातीवर लोळण घेतो.आपण किती वेळ तिथे पडलेलो आहोत याचं त्याला भान नसतं.थोड्या वेळाने त्याला भास होतो की त्याची जुनी मैत्रीण ज्युली त्याला हाक मारते आहे. त्याला कळत नाही,या वाळवंटात अचानक ज्युली कुठे आली? तो डोळे किलकिले करून बघतो,तर ती त्याला हात देऊन उठवण्याचा प्रयत्न करत असते.'ऊठ,थांबून चालणार नाही.तुला चालत राहायला हवं',असं म्हणत असते.रिकी खरोखर उठून पुन्हा चालू लागतो.आपल्या अंगातली शक्ती पूर्ण संपलेली असताना आपण कसे चालतो आहोत हे त्याचं त्यालाही कळत नाही.हा भास म्हणजे नेमकं काय होतं याचा विचार करण्याची शक्तीही त्याच्याकडे नसते.पण 'जो स्वतःला मदत करतो त्यालाच देवही मदत करतो' हे लहानपणी ऐकलेलं वचन खरं होतं तर, असं त्याच्या मनात येतं. या प्रसंगानंतर तो देवाची खऱ्या अर्थाने प्रार्थना करतो.तो म्हणतो, 'देवा, मला मदत कर.मी तुला कुठलाही चमत्कार घडवायला सांगत नाहीये.फक्त मी जगावं असं या जगात कुणाला तरी वाटतं आहे ना,एवढं मला सांग.'


अंगातली शक्ती संपून आता दिवस उलटलेले असतात. आता आपली सुटका कशी होईल,या विचारापेक्षा आपल्याला पाणी कसं मिळेल,या विचाराने रिकीचं मन व्यापलेलं असतं.कुठेही थोडी ओली जमीन दिसली की त्याखाली खणून तो पाण्याचे काही थेंब मिळवण्याचा प्रयत्न करत असतो,झाडांच्या पानांवरचा ओलावा चाटत असतो.चार-पाच दिवसांच्या पायपिटीनंतर त्याला पायाखालची जमीन बदललेली जाणवू लागते. जमिनीतला ओलावा वाढलेला असतो.त्याला छोटी छोटी डबकी दिसू लागतात आणि त्या डबक्यांचा माग रिकीला चक्क एका छोट्या नदीपाशी घेऊन जातो. स्वच्छ पाण्याने भरलेली वाहती नदी! एवढं पाणी पाहून त्याचा पहिला प्रतिसाद असतो,की आता आपल्याला आणखी काहीही मिळालं नाही तरी चालेल.त्यानंतर कित्येक तास तो नदीत डुंबून पाणी पीत राहतो.आता नदीच्या किनाऱ्यावरून तिच्या प्रवाहांसोबतच पुढे चालत राहायचं ठरवतो.तापलेल्या जमिनीवरून, काट्याकुट्यांतून चालण्यापेक्षा ते किती तरी चांगले असे त्याला वाटतं पण प्रत्यक्षात तो चालायला सुरुवात करतो तेव्हा मात्र लक्षात येतं.की जमिनीवर काटेकुटे आणि दगड असतील तर नदीचं पात्रही कमी धोकादायक नाही.त्यातून चालणंही रिकीच्या पावलांसाठी तितकंच प्रासदायक ठरतं.पण जमेल तेवढं पोहत जमेल तेवढं पाण्याच्या प्रवाहासोबत वाहत रिकी पुढे जात राहतो.पाण्याजवळ असण्याचा दुसरा त्रास असतो तो डास आणि पिसवांचा.त्यांच्या झुंडीच्या झुंडी रिकीच्या अंगाभोवती घोंघावत त्याला फोडून काढायला सुरुवात करतात.


नदीच्या एका वळणावर रिकीला पहिल्यांदाच काही मानवनिर्मित खुणा दिसतात.ती एक पवनचक्की असते. ज्याअर्थी इथे पवनचक्की उभारलेली आहे त्याअर्थी इथे कोणी ना कोणी तरी येत असणार.आजच नव्हे,पण किमान एक-दोन दिवसांत कोणी तरी नक्की इथे येईल आणि आपली सुटका होईल अशी रिकीला आशा वाटते.त्यामुळे ती रात्र तो या पवनचक्कीपाशी काढायचं ठरवतो.आपण पवनचक्कीच्या पात्यांखालच्या प्लॅटफॉर्मवर बसलो तर वरून लांबवरचं दृश्य दिसेल आणि डासांपासून सुटका होईल,या विचाराने रिकी तिथे जाऊन बसतो.डास आणि पिसवांचा त्रास थोडा कमी होतो पण पूर्ण संपत नाही.ती रात्र तो तिथेच काढतो. दुसऱ्या दिवशी वरून त्याला पवनचक्कीची डझनभर पाती पडलेली दिसतात.त्याच्या डोक्यात येतं,त्यांचा उपयोग करून रात्रीसाठी आसरा तयार करावा.रात्रीचा पाऊस आणि डासांपासून सुटका करून घेता आली तर या नदीशेजारी राहण्यासारखं सुख नाही,असा विचार तो करतो.चार दिवस मेहनत करून तो पवनचक्कीच्या पात्यांपासून एक छोटं खोपटं तयार करतो.रात्री मुसळधार लागली तर ते खोपटं गळत असतं,पण तरीही मिळालेला आसराही रिकीसाठी लाख मोलाचा असतो. या खोपटात तो बरेच दिवस काढतो.त्या काळात तिथे जोरदार पाऊस पडतो.त्यामुळे त्या काळात सुटकेची शक्यता अशी नसतेच.पण पाऊस कमी झाल्यावरही तिथे कोणी फिरकत नाही म्हटल्यावर आता पुन्हा पुढे जाण्याची वेळ आली आहे,असं रिकी स्वतःला पटवतो आणि चालू लागतो.निघण्याआधी पवनचक्क्यांच्या पात्यांपासून SOS चं चिन्ह काढून ठेवायला तो विसरत नाही.


मधल्या काळात त्याच्या शरीराला थोडी विश्रांती मिळालेली असते,नदीच्या किनारी उगवलेलं कोवळं गवत खायला मिळालेलं असतं;पण त्यामुळे उलट रिकीच्या पोटातली भुकेची भावना वाढीस लागते.


◆◆◆ अपूर्ण ■■■

६/३/२६

शार्लमन / Charlemagne

महंमदाच्या मरणानंतर पुष्कळशा शतकांनंतर हे जग मुसलमान व ख्रिश्चन यांच्यामधील युद्धभूमी झाले.मशीद व चर्च यांमध्ये लाजिरवाणी स्पर्धा सुरू झाली होती.शरीरे मारून मानवी मनाचा ताबा कोणी घ्यायचा याबाबत या दोघांमध्ये शर्यत लागली होती.वास्तविक पाहता,खरा मुसलमान ईश्वरशरण असतो,व खरा ख्रिश्चन शांतीचे उपनिषद् मानतो. पण अनुयायी मिळविण्याच्या स्पर्धेत दोघांनाही आपापल्या सत्यधर्माचा विसर पडला.या दोन्ही धर्मांस उगाच नावे ठेवायची अशातला भाग नाही. नेहमीच तलवारीने धर्म लादला गेला असे नाही. कितीतरी मुसलमान व (शार्लमन : पोपला वाचवून स्वतः सम्राट होणारा,

मानवजातीची कथा,हेन्री थॉमस,अनुवाद - सानेगुरुजी, मधुश्री पब्लिकेशन)


खिश्वन असे होते की,त्यांनी आपल्या उदार व उदात्त वर्तनाने परधर्मीयांमध्ये ईश्वरशरणागतीचा सुंदर मुस्लीम धर्म व प्रेमाचा खिश्चन धर्म यांचा प्रसार केला.पण त्या त्या धर्मानुयायांचे पुढारी महत्त्वाकांक्षी असत,त्यांना कशाचीही दिक्कत नसे. धर्माच्या मिषाने,धर्माच्या बुरख्याखाली व ईश्वराच्या नावाने ते स्वार्थ साधू पाहत.महंमदानंतर जे मुस्लीमांचे खलिफा झाले,त्यांनी मुस्लीम धर्म व मुस्लीम सत्ता रक्ताने सर्वत्र चालू करण्याचे व्रत उचलले.आफ्रिकेचा उत्तर भाग व युरोपातील स्पेन देश वगैरेंकडे हाती तलवार घेऊन ते दयाळू अल्लाचे भीषण वैभव पसरवीत चालले.ख्रिश्चन धर्मीय राजांनीही प्रेमसिंधू येशूचा धर्म पश्चिम युरोपभर रक्ताने शिकविला.

मुसलमान आपला धर्म वर उत्तर फ्रान्समध्ये नेऊ लागताच खाली स्पेनमध्ये येणाऱ्या ख्रिश्चनांशी त्यांची झटापट झाली.महंमदाच्या मरणानंतर बरोबर शंभर वर्षांनी टूर्स येथे झालेल्या मोठ्या लढाईत शार्लमनचा आजा चार्लस मार्टेल (मार्टेल = धाव घालणारा) याच्या सेनापतित्वाखाली लढणाऱ्या ख्रिश्चनांचा विजय झाला.


चार्लस मार्टेल हा फ्रान्सच्या राजाचा मुख्य प्रधान होता.त्या वेळचे फ्रेंच लोक आजच्या फ्रान्समध्ये व जर्मनीमध्ये राहत होते;फ्रान्समध्ये राहणारे ज्या भाषेतून पुढे आजची फ्रेंच भाषा बनली,ती भाषा बोलत व जर्मनीत राहणारे फ्रेंच ज्या भाषेतून पुढे आजची जर्मन भाषा बनली,ती 'टिओटिक' म्हणजे 'जनतेची भाषा' बोलत.अशा रीतीने भाषांत फरक होते,तरी प्रसंगी फ्रेंच व जर्मन एकच होते,दोघांचा राजाही एकच होता.चार्लस मार्टेलच्या वेळी राजा केवळ नामधारी होता.मुख्य प्रधानच सर्वसत्ताधीश अनभिषिक्त हुकूमशहा होता.टूर्स येथे फ्रँकांनी मुसलमानांचा पराजय केला त्याचे श्रेय राजाकडे न जाता चार्लस मार्टेल यालाच मिळाले.'ख्रिश्चन धर्माचा त्राता','ख्रिस्ताचे नाव राखणारा',म्हणून त्याचा गौरव करण्यात आला. इटलीतील लंबार्डियन लोक ख्रिश्चन शिकवण मानीत नव्हते,म्हणून त्यांच्यावर स्वारी करण्यासाठी पोपने मार्टलला गौरवपूर्वक बोलावले;पण पोपला साह्य करण्यापूर्वीच मार्टल मरण पावल्यामुळे ते काम 'ठेंगणा पेपिन' नावाच्या त्याच्या मुलावर पडले.तो फ्रैंकाच्या राजाचा मुख्यमंत्री होता;पण मुख्य प्रधानकीवर त्याला समाधान नव्हते;राजा होण्याची त्याची महत्त्वाकांक्षा होती.इटलीत जाण्यापूर्वी ज्याच्या हाती खरोखर खरी राजसत्ता आहे,

त्यानेच राजा का होऊ नये?"असा मोठा मुत्सद्देगिरीचा व सूचक प्रश्न त्याने पोपला केला. पोपने होकारार्थी उत्तर पाठवून फ्रँकांचा राजा "चाइल्डेरिक" याला भिक्षू होण्यास सांगितले व पेपिनला 'ईश्वराच्या कृपेने झालेला फ्रँकांचा राजा' म्हणून गादीवर बसविले


पोपच्या या उपकाराची परतफेड म्हणून पेपिनने इटलीवर स्वारी केली व लंबार्डीतील लोकांना जिंकून त्यांची अनेक शहरे पोपला भेट म्हणून दिली.'पेपिनची देणगी' या नावाने ही भेट प्रसिद्ध असून हिच्या योगानेच चर्चच्या ऐहिक वैभवाचा, पृथ्वीवरील सत्तेचा प्रारंभ झाला.यापूर्वी पोप केवळ काल्पनिक अशा स्वर्गातील राज्यातच दंग असत; पण यानंतर ते पृथ्वीवरच्या खऱ्याखुऱ्या धनदौलतीत रस घेऊ लागले.

चर्चचे व स्टेटचे लग्न लागले,पेपिनच्या देणगीपासून सुमारे हजार वर्षे चर्चने जगावर प्रभावी वर्चस्व गाजविले,व ते बव्हंशी शापप्रद व दुःखदायकच होते.


ठेंगू पेपिन इ.स. ७६८ मध्ये मरण पावला व त्याचा मुलगा शार्लमन हा न्यूस्टिया व आस्ट्रेशिया म्हणजे आजचे फ्रान्स व जर्मनी यांचा राजा झाला.शार्लमन या शब्दाचा अर्थ मोठा चार्लस शार्लमन पित्याप्रमाणेच महत्त्वाकांक्षी वीर होता,

चर्चचा कड़वा रखवालदार होता.उत्तर स्पेनमध्ये त्याने सारासीन मुसलमानांचा पराजय केला. सारासीनांना युरोपातून संपूर्णपणे हाकलून देण्याचा प्रयत्न त्याने केला;पण त्याला त्यात यश आले नाही.ही जी पवित्र युद्धे चालली होती,त्यांचा परिणाम म्हणून शेवटी मुसलमान व ख्रिश्चन यांच्या दरम्यान पिरनीज पर्वत ही हद्द ठरली.दक्षिण स्पेनची सत्ता मुसलमानांनी आपल्या हाती ठेवली.ख्रिश्चन लोक शार्लमनच्या पवित्र मुठीच्या संरक्षणाखाली उत्तरेकडे,तद्वतच पूर्व युरोपभर पसरले.न्यूस्ट्रिया,आस्ट्रेशिया,क्रिशिया,

अक्विटेनिया,बर्गंडी, बव्हेरिया, लंबार्डी,सॅक्सनी इत्यादी सर्व प्रदेशांवर शार्लमनची सत्ता प्रस्थापित झाली.शार्लमनला सॅक्सनीबरोबरच बरीच लढत द्यावी लागली.तेथील लोक बरेच हट्टी होते.ते एकदम नवीन धर्म पत्करीनात.पण शार्लमनने एका दिवसांत साडेचार हजार लोकांची कत्तल करून शेवटी त्यांच्या गळी ख्रिश्चन धर्म उतरविलाच.जे जिवंत राहिले,त्यांनी ख्रिस्त हा दयाळू आहे हे मुकाट्याने कबूल करून बाप्तिस्मा घेतला व ख्रिश्चनांचा धर्म स्वीकारला.


इ.स. ७९९ मध्ये शार्लमनला जरा नाजूक कामगिरी करायची होती.पोप तिसरा लिओ याच्यावर व्यभिचाराचा आरोप करून स्थानिक संस्कृतिसंरक्षकांनी त्याला मरेमरेतो ठोकले.शेवटी, तो आश्रयार्थ एका मठात गेला.त्याने शार्लमनची मदत मागितली.शार्लमन हा धर्माचा परित्राता होता, संघटित चर्चचा संरक्षक होता.शार्लमनने गुन्ह्याची चौकशी करून पोप निर्दोषी आहे,असे जाहीर केले. पोप खरोखर गुन्हेगार होता की नाही,हा भाग वेगळा;पण न्यायाधीश म्हणून बसण्याला मात्र शार्लमन लायक नव्हता.कारण तो निष्ठावंत ख्रिश्चन असला,तरी त्याच्या आवडीनिवडी मुसलमानी होत्या.त्याच्या चार बायका होत्या,पाच रखेल्या होत्या,त्याला सतरा मुले होती,

त्यांपैकी बरीच अनौरस होती.पण त्याने पोपला निर्दोष ठरविल्यामुळे पोपचे कल्याण झाले,त्याचप्रमाणे त्याचा स्वतःचाही फायदा झाला. इ.स. ८०० च्या नाताळच्या दिवशी तो सेंट पिटरच्या चर्चमध्ये प्रार्थना करीत असता एकदम पोप लिओ जणू काय दैवी प्रेरणा झाल्याप्रमाणे तिथे आला व त्याने शार्लमनच्या मस्तकावर सुवर्णमुकुट ठेवला. शार्लमन चकित झाला,निदान वरपांगी तरी त्याने आश्चर्यचकित झाल्यासारखे दाखविले.वास्तविक, त्या क्षणाची तो वाटच पाहत होता.तो मुकुट तयार झाल्याचे,तद्वतच पोप त्या दिवशी त्याच्या डोक्यावर ठेवणार असल्याचे,त्याला माहीत होते.तो जणू प्रार्थनेतच तन्मय झाला होता,प्रभुचितनात एकरूप झाला होता! त्याच्या डोक्यावर मुकुट ठेवला जाताच त्याने चकित होऊन डोळे उघडले.


नाटक बेमालूम वठले.प्रभूने जणू शार्लमनला सम्राट बनविले.प्रभूनेच पोपला ऐन वेळी स्फूर्ती दिली, असे सर्वत्र बोलले जाऊ लागले.शार्लमन अती पवित्र व देवाचा लाडका म्हणून मानला जाऊ लागला.जुन्या रोमन साम्राज्याची पुनर्स्थापना करून विजयी ख्रिस्ताच्या नावे नवे राज्य स्थापण्यासाठी शार्लमनची ईश्वरानेच निवड केली असे सर्वजण म्हणू लागले.शार्लमनला बाहत्तर वर्षांचे आयुष्य लाभले.त्याने मठ बांधले,लॅटिन भाषेच्या व्याकरणात ढवळाढवळ केली व त्याला नीट लिहिता-वाचता येत नव्हते,तरी ज्योतिष व तत्त्वज्ञान या विषयांतही त्याची लुडबूड चालूच होती!न ऐकणाऱ्यांच्याही डोक्यात सोटे मारून तो बायबल कोंबू पाहत होता.तो दारू पित होता; मांसाच्या मिटक्या मारीत होता;परधर्मीयांना स्वधर्मात आणीत होता,त्यांच्या बायकांस आपल्या विलासस्थानी नेत होता.ईश्वराची पूजा करीत होता व बेकायदा मुलेही पैदा करीत होता.अशा लीला करीत इ.स. ८१४मध्ये या स्वारीने देह ठेवला.पुढे तीनशे वर्षांनी ख्रिश्चन चर्चने त्याच्या कामगिरीचा गौरव करून त्याला संत केले.पण ख्रिस्ताने अशांचा अंतर्भाव आपल्या मित्रांत खचित केला नव्हता.ख्रिश्चन धर्म वाढविण्याची त्याला इतकी तहान लागली होती की,त्या भरात ख्रिस्ताच्या शिकवणीचा आत्माही तो विसरून गेला.ईश्वराच्या नावाआड स्वतःची पापकृत्ये लपविणाऱ्या दांभिक गुंडांमधला तो मुकुटमणी होता !


◇◇◇ समाप्त..◇◇◇


४/३/२६

चिम्पॅन्झी व जेन गुडाल / Chimpanzees and Jane Goodall

जेन गुडाल हिचा जन्म लंडन येथे १९३४ साली झाला.तिचं शिक्षण बोर्नमाऊथ इथं झालं.तिचे वडील पेशाने इंजीनिअर होते.दुसऱ्या महायुद्धाला सुरवात होताच त्यांना फ्रान्स व नंतर मलायात पाठवण्यात आले.तेव्हा तिची आई- वान्ने ही जेन व दुसऱ्या मुलीला घेऊन खेड्यात राहणाऱ्या आईकडे राहायला गेली.त्यावेळी जेन पाच वर्षांची होती. कोंबडीच्या खुराड्यात स्वतःला कोंडून घेऊन कोंबडी अंडी कशी घालते हे तासन्तास पाहत राही.तिच्या आईला ते ठाऊक नसे.ती घाबरून जाई व पोलिसांकडे जेन हरविल्याची तक्रार नोंदवी.


जेनला प्राण्यांविषयीची पुस्तके आवडत.विशेषतः ह्यूग लॉफ्टिंग याचे डॉक्टर डू लिटज याच्या साहसकथा तिला खूप आवडायच्या.एका प्रसंगी ते आफ्रिकेतील हजारो माकडांना झालेल्या साथीच्या रोगापासून मुक्त करायला जातात.जेन ही आठवण सांगताना लिहिते "त्यावेळी मी आठ वर्षांची असेन. तेव्हापासून मला वाटे,की आपणाला आफ्रिकेतील वन्य प्राण्यांबरोबर राहायचं आहे."


अठराव्या वर्षी शाळा सोडून ती लंडन येथील एका फिल्म स्टुडिओत कामाला लागली.तिच्या वर्गमैत्रिणीचे आईवडील केनिया येथे शेती करीत.या मैत्रिणीनं जेनला केनियाला येण्याचं आमंत्रण दिलं.तिने ते लगेच स्वीकारलं.नैरोबी येथे तिची भेट प्रसिद्ध मानववंश शास्त्रज्ञ लुई लिके यांच्याशी झाली.ते त्यावेळी केनिया येथील नॅचरल हिस्ट्री म्युझियमचे क्युरेटर होते.त्यांनी तिला सचिव म्हणून कामावर घेतलं.१९५७ साली त्यांनी टांगानिका सरोवराच्या किनाऱ्यावर टांझानिया येथे आढळून येणाऱ्या चिम्पॅन्झीचं अनेक महिने ती निरीक्षण करू शकेल काय,असं तिला विचारलं. आलेल्या या अनपेक्षित संधीनं तिचं मन हरखून गेलं. लिके यांनी या योजनेसाठी आवश्यक तो पैसा मिळवला.ती इंग्लंडला परत गेली आणि तिथल्या समृद्ध ग्रंथालयातून चिम्पॅन्झी या विषयावरील जेवढी पुस्तकं मिळतील तेवढी अठरा महिन्यांच्या काळात तिनं वाचली.


जून १९६० साली जेन आईला सोबत घेऊन आफ्रिकेत पोचली.त्या वेळी वान्ने गुडालचं वय ८४ वर्षांचं होतं. चिम्पॅन्झीच्या गॉम्बे संरक्षण क्षेत्रात【चिम्पॅन्झी बरोबर राहणारी जेन गुडाल,शब्दांचं धन,मारुती चितमपल्ली, प्रकाशक,मकरंद कुलकर्णी,साहित्य प्रसार केंद्र,सीताबर्डी,नागपूर】पहिल्या आगमनाची आठवण अजूनही ती विसरली नव्हती.टांगानिका सरोवराकाठची मोकळी जागा तेथील वनरक्षकांनी दाखविली.तिथं त्या मायलेकीनं राहण्यासाठी राहुटी उभी केली.


आई म्हणते "तिथल्या किनाऱ्यावर बबून माकडं खेळत होती.बाकी जिकडे तिकडं विलक्षण सामसूम.आम्ही गर्दीपासून खूप दूर आलो होतो."


सूर्य उगवताच जेन रोज ७६० मीटर उंच असलेल्या पर्वत शिखरावर चढे.तेथून ती जंगलातल्या चिम्पॅन्झीचा शोध घेई.किती तरी आठवडे गेले.तिला त्याचं फक्त दुर्बिणीतून निसटतं दर्शन होई.म्हणून ती रात्र रात्र त्या शिखरावर मुक्कामाला राही.तिला बघताच चिम्पॅन्झी पोबारा करीत. गोम्बेला येऊन आठ महिने झाले.जेन नित्याप्रमाणे जंगलातून वर वर चढत होती,तर तिच्या वाटेवर समोर चिम्पॅन्झी बसलेला.जवळच वरच्या एका फांदीवर बसलेल्या नराचा तिनं हू असा आवाज ऐकला. तिच्या डाव्या बाजूला सळसळ ऐकू आली अन् समोर चमकणारे काळे डोळे दिसले.तिच्या मागेच हू असा दुसरा आवाज आला.चिम्पॅन्झीच्या कळपानं तिला घेरलं होतं.झाडावर बसलेल्या चिम्पॅन्झीनं एकमात्र हा ऽ आऽ आह अशी आरोळी ठोकताच जेन भीतीनं गर्भगळित झाली.तो जोरजोरानं फांदी हलवीत होता.इतर चिम्पॅन्झीनं त्याच्या आवाजाचं अनुकरण केलं. कावरी-बावरी झालेली जेन एका ठिकाणी दबा धरून बसली.रागानं अनावर झालेला,साऱ्या अंगावरले केस ताठ झालेले असा एक चिम्पॅन्झी झुडपांतून सरळ तिच्यावर धावला.नंतर वळून त्यानं जंगलाची वाट धरली.सारे चिम्पॅन्झी त्याच्या मागे निघून गेले.


जेन या प्रसंगाविषयी लिहिते "कशी तरी मी उठून उभी राहिले.त्या जंगलात फक्त माझ्याच हृदयाच्या ठोक्यांचा आवाज येत होता." तिची भीती पार उडाली.आलेल्या अद्भुत अनुभवाची तिला मौज वाटली.तिला वाटलं त्या चिम्पांझींना आता तिची भीती वाटत नाही.त्यांनी तिला स्वीकारलं आहे.


खरा प्रसंग पुढं घडला.राखी पांढरी दाढी असलेल्या एका रुबाबदार नराने तिच्या राहुटीतील केळी पळवली. त्याचं नाव तिनं दाढीवाला डेव्हिड असं ठेवलं.नंतर काही दिवसांनी तो आपल्या दोघा सोबत्यांबरोबर तिच्या अगदी जवळ आला.पहिल्यांदा जेन इतक्या जवळून चिम्पॅन्झीला बघत होती.दाढीवाल्या डेव्हिडनं आपसात खरा संवाद साधण्याची संधी पहिल्यांदा जेनला दिली होती.ओढ्याकाठी असलेल्या डेव्हिडचं ती निरीक्षण करीत होती.


तिनं एक पिकलं फळ उचललं आणि तळहातावर ठेवून तो त्याच्यापुढं केला.त्यानं त्या हाताकडं पाहिलं,नंतर तिला बघितलं.तो तिच्याजवळ आला.त्यानं आपला हात तिच्या हातावर ठेवला.काही क्षण तिचा हात हळुवार दाबला.या अभूतपूर्व प्रसंगाविषयी ती लिहिते "त्यानं मला दिलेल्या आश्वासनाचं शास्त्रीयदृष्ट्या कसलं स्पष्टीकरण करणार! माझ्या अपेक्षेपेक्षा मला फार मोठं श्रेय मिळालं होतं."


गोम्बेच्या जंगलात केलेली जेन गुडालची संशोधनं आणि अभ्यासपूर्ण निरीक्षणे लिकेनं प्रसिद्ध केली.तिनं रानटी चिम्पॅन्झीवरची निरीक्षणे चालू ठेवली.आता गोम्बे, राष्ट्रीय उद्यान म्हणून ओळखलं जातं.


१९६१ सालापर्यंत तिनं चिम्पॅन्झीच्या वर्तणुकीविषयी असामान्य ज्ञान अवगत केलं होतं.एवढ्या संशोधनाच्या आधारे केम्ब्रिज विद्यापीठात तिला इथॉलॉजी वर्तणुकीवर पीएच.डी.करण्याची परवानगी मिळाली. १९६२ साली तिला इंग्लंडला जाण्याची परवानगी दिली. तिथल्या अठरा महिन्यांच्या वास्तव्यात चिम्पॅन्झीवरील प्रबंध विद्यापीठाला सादर करून ती परत गोम्बे राष्ट्रीय उद्यानात दाखल झाली.आचार्य ही पदवी मिळाल्यावर आता सारं काही संपलं,असं तिला वाटलं नाही.


चिम्पॅन्झीविषयी जेनला जेवढं ज्ञान प्राप्त झालं,तेवढं क्वचितच कुणाला असेल.आयुष्यातील तीन तपं ती आफ्रिकेच्या घनदाट जंगलात राहिली.६५ वर्षांच्या वयातही जेनला वृद्धापकाळानं स्पर्श केला नव्हता.त्या वेळीही ती एखाद्या तरुणीसारखी दिसे.ती रोज पहाटे उठून जंगलाची वाट धरायची. तासन्तास ती चिम्पांझींचं निरीक्षण करायची.कित्येकदा अनेक दिवस त्यांच्या जीवनक्रमाचं अवलोकन करी.ते खातात काय,भितात कशी,प्रेम कसं,मातापित्यांचं वात्सल्य कसं,मृत्यू कसा- इत्यादी त्यांच्या जीवनाच्या अनेक पैलूंवरील दुर्मिळ निरीक्षणाच्या तिनं नोंदी केल्या आहेत.आजतागायत तिनं सहा ग्रंथांची निर्मिती केली आहे.शेकडो निबंध लिहिले आहेत.एखाद्या वन्य प्राण्याविषयी इतकं दीर्घकाळ संशोधन कोणी केलं नाही.


चिम्पॅन्झीवर लिहिलेल्या प्रबंधावरून तिनं 'इन द शेंडो ऑफ मॅन' हा ग्रंथ १९७१ मध्ये सिद्ध केला. या ग्रंथाचा सतरा भाषांत अनुवाद झाला आहे.शास्त्रज्ञ आणि सामान्य रसिक वाचक अशा सर्वांना तो सारखाच आवडला.चिम्पॅन्झीविषयी तिला अवगत झालेलं ज्ञान तिनं मोठ्या लालित्यपूर्ण भाषेतसादर केलं आहे. शास्त्रीय विधानं करताना कुठंही दुर्बोधता येऊ दिली नाही.तिचं सारं लेखन निर्मितीच्या पातळीवर जातं.

चिंतनाद्वारे तिला झालेलं जीवनदर्शन सोप्या, साध्या,सरळ भाषेत प्रकट केलं आहे.


"तिच्या लेखनात शास्त्रज्ञाची शिस्त व माणसांची संवेदना दिसून येते," असे अनेक विद्वान शास्त्रज्ञांनी तिच्या लेखनाविषयी अभिप्राय व्यक्त करताना लिहिले आहे. 'द चिम्पॅन्झी ऑफ गोम्बे' हा ग्रंथ १९८६ मध्ये प्रसिद्ध झाला.

त्यात ज्या चिम्पॅन्झीच्या कळपाचा तिनं अभ्यास केला,

त्यातील प्रत्येकाला त्यांच्या स्वभावानुसार नावे दिली आहेत.प्रत्येकाला ती नावानं ओळखत असे.


या तिच्या उत्कृष्ट ग्रंथाने विक्रीचा उच्चांक गाठला.तिचं तिसरं पुस्तक १९८९ साली प्रसिद्ध झालं.या साऱ्या ग्रंथांतून सचित्र पुराव्यानुसार चिम्पॅन्झीचा जीवनवृत्तान्त दिला आहे.पूर्वसूरींनी चिम्पॅन्झीच्या वर्तणुकीविषयी जी गृहिते व्यक्त केली होती,त्यांना तिनं आपल्या संशोधनाने छेद दिला आहे.विकल,वुल्फी,सैतान व स्प्राऊट यांची तिनं दिलेली शब्दचित्रं जगातील शास्त्रज्ञ आणि सामान्य वाचकांना आवडली.


१९६३ साली तिनं दाढीवाल्या डेव्हिडचं निरीक्षण केलं.ती त्याला चांगलं ओळखत होती.त्यानं एकदा सुळ्या दातांनी मृत रानडुकरांची चिरफाड करून त्याचं मांस खाल्लं.रानटी चिम्पॅन्झीनं मांस खाल्याची ही पहिली नोंद.नंतर तिनं निरीक्षणाच्या आधारे सिद्ध केलं की,चिम्पॅन्झी हे माकडं,

रानडुकरं व हरणाची पाडसं खातात.ते कळपानं शिकार करतात व नंतर मांस वाटून खातात.


माणसाला बुद्धी असते म्हणून शिकारीसाठी हत्यार वापरतात असं नव्हे;तर चिम्पॅन्झीदेखील त्याचा उपयोग करतात.एकदा दाढीवाल्या डेव्हिडनं गवताची लांब काडी तोडली अन् वारुळाच्या छिद्रात घातली.लगेच ती बाहेर काढली.त्यावर वाळवी होती.ती लगेच त्यानं खाल्ली.आणखी एक हत्यार चिम्पॅन्झी उपयोगात आणतात.ते आहे पानांचा चोथा.जंगलात ढोली असलेले वृक्ष असतात.त्यात पावसाचं पाणी साठतं.परंतु,ते पाणी खोलात असल्यानं पिता येत नाही.त्यासाठी एक युक्ती करतात.मूठभर पाला चावून त्याचा चोथा झाला,की ढोलीतल्या पाण्यात टाकतात.चोथा पाण्यानं ओला होतो.ढोलीतून तो काढून त्यातील पाणी चिम्पॅन्झी शोषून घेतात.जेन म्हणते,"कुठल्याही इतर प्राण्यापेक्षा चिम्पॅन्झी अनेक प्रकारच्या वस्तू अनेक कारणास्तव उपयोगात आणतात.अशी बुद्धी फक्त माणसाजवळ आहे." चिम्पॅन्झीविषयी अनेक वर्षांच्या संशोधन आणि अभ्यासानंतर तिला आढळून आलं,की त्यांच्यात आणि मानवाच्या स्वभावात साम्य आहे.ती म्हणते, "जीवशास्त्रीय उत्पत्ती अथवा जननशास्त्राचा विचार केला,तर चिम्पॅन्झी आणि मानवात नव्वद टक्के साम्य आहे.तसेच त्यांच्या आणि आपल्या जीवनचक्रात साधर्म्य आहे.षनःहबाल्यावस्था पाच वर्षे,पौगंडावस्था नऊ ते तेरा वर्षे,प्रजोत्पत्ती व वृद्धापकाळ पस्तीस किंवा चाळीस वर्षे आणि रानटी अवस्थेत पन्नासाव्या वर्षांच्या आसपास मृत्यू."


आपल्याप्रमाणे चिम्पांझींच्या स्वभावातही भय,दुःख, राग,लोभ व असूया हे गुण आहेत.मित्र आणि परिवाराशी अनेक पिढ्यांचे स्नेहसंबंध असतात.जेनला आढळून आलं,

की चिम्पॅन्झी माता आपल्या लहान पिलाला छातीशी धरून गोंजारतात.दीर्घ काळाच्या ताटातुटीनंतर मित्र उराउरी भेटतात.हस्तांदोलन करतात. पिलं हात पसरून अन्नाची भीक मागतात.त्यांचे दुःखदेखील आपल्याइतकेच खरे आहे.जेव्हा फ्लो या वृद्ध मातेने खाली कोसळून प्राणत्याग केला,तेव्हा तिचा मुलगा फ्लिंट तिच्या प्रेताजवळ अनेक दिवस बसून होता. लवकरच त्यानं अन्नत्याग केला.तिच्या मृत्यूनंतर एका महिन्यानं शोकाकुल अवस्थेत आईनं जिथं देह ठेवला होता तिथंच त्यानं प्राण सोडला.


या ग्रंथात एक हृदयस्पर्शी प्रसंग आहे.चिम्पांझींना नवबालकांचं मोठं कौतुक वाटतं.कळपातील साऱ्या जणांचा या बालकांवर लोभ असतो.त्याला कुठं ठेवू अन् कसं करू असं वाटतं.एका चिम्पॅन्झी मातेला वाटलं,की आपलं बाळ जेनला दाखवावं,म्हणून ती जेनचा परकर ओढू लागते.तिच्या या वागणुकीचं तिला आश्चर्य वाटतं.

म्हणून जेन तिच्या मागोमाग जाते.ती एका झुडपाजवळ थांबते.माता त्या झुडपातून पिलाला बाहेर काढून जेनला दाखवते.या प्रसंगावरून असं वाटतं,की जेन चिम्पांझींच्या जीवनाशी किती एकरूप झाली होती, तिनं त्या वन्य प्राण्यांचा किती विश्वास संपादन केला होता! नाही तर वन्य प्राणी आपल्या पिलाजवळ माणसाला अजीबात येऊ देत नाहीत.


युरोप आणि अमेरिकेतून डझनावरी विद्यार्थी तिच्याबरोबर सहायक म्हणून काम करायला आले. परंतु,ही योजना अकस्मात मे १९७५ साली बंद करण्यात आली.त्याचं कारण असं घडलं,की काही आतंकवादी शस्त्रे घेऊन टांगानिका सरोवराच्या शिबिरात आले.बंदुकीच्या नळीसमोर तिथल्या चौकीदाराला धरून त्यांनी जेन गुडालचा ठावठिकाणा विचारला.परंतु,त्यानं सांगायचं नाकारलं,तेव्हा त्या हल्लेखोरांनी तिघा अमेरिकन व डच संशोधकांना गौर येथे पळवलं.दोन महिने त्यांना खंडणीसाठी तिथं डांबून ठेवलं आणि भरपूर खंडणी मिळाल्यावर त्यांना सोडून देण्यात आलं.या जीवघेण्या प्रसंगानंतर गोम्बे येथे परदेशी संशोधक येईनासे झाले.परंतु,न डगमगता धैर्यानं जेननं टांगानिका येथील रहिवाशांना क्षेत्र सहायकांचे शिक्षण देऊन संशोधनासाठी संघ तयार केला.आज तिथं निष्ठेने काम करणाऱ्या बावीस जणांचा संघ कार्यरत आहे.जेन त्या सहायकांविषयी म्हणते, "त्या साऱ्यांचं चिम्पॅन्झीवर माझ्याइतकंच प्रेम आहे.आपल्या खेड्यात ते चिम्पॅन्झीविषयी बोलतात आणि आपल्या परिवाराला त्यांच्या हालचाली बघण्यासाठी आणतात."


१९६४ साली जेननं ह्युगो वॅन लॉविक या डच छायाचित्रकाराशी विवाह केला. ह्युगो वन्य प्राण्यांचा उत्तम छायाचित्रकार होता. 'इन द शॅडो ऑफ मॅन' या ग्रंथातील चिम्पॅन्झी व जेनची छायाचित्रं ह्युगोने काढली आहेत.त्या ग्रंथाची समृद्धी वाढविण्यातत्याचंही श्रेय आहे.पुढे या उभयतांनी 'इनोसन्ट किलर्स' हा ग्रंथ लिहिला.त्यात रानकुत्री,कोल्हा आणि तरस या वन्य प्राण्यांची अप्रतिम छायाचित्रं आहेत.या दोघांचं गोम्बेमध्ये एकत्र येणं म्हणजे सुवर्णमणिकांचन योग होता.१९६७ साली गोम्बे येथे त्यांना मुलगा झाला. त्याचे नाव ग्रब.तो बालपणापासून जंगलातच वाढला.आता तो पूर्व आफ्रिकेत वन्यजीवांविषयी संशोधन करतो.या मुलाला तिनं जंगलात कसं वाढवलं याचा वृत्तांत तिनं 'ग्रब द बुशबेबी' या पुस्तकात दिला आहे.


जेन व ह्युगोचा विवाह अयशस्वी ठरला.नंतर १९७५ साली तिनं डेरेक ब्रायसेमन यांच्याशी पुनर्विवाह केला. ते टांझानिया राष्ट्रीय असेंब्लीचे सभासद आणि तेथील राष्ट्रीय उद्यानाचे संचालक होते.दुर्दैवाने १९८५ साली त्यांचं कॅन्सरनं निधन झालं.


आज तेथील स्थानिक अधिकारी तिला ममा ब्रायसेमन म्हणतात.दार-ए-सलाम येथील समुद्रकिनाऱ्यावर तिचं घर आहे.दर वर्षी तिथं काही काळ तिचं वास्तव्य असतं. त्यावेळी ती आपल्या रसिक चाहत्यांच्या पत्रांना उत्तरे देते आणि संशोधनाविषयी पुस्तकं व निबंध लिहून चिम्पॅन्झीविषयी जगाला अद्ययावत ज्ञान देते.वर्षांतील आठ महिने ती अमेरिका व युरोप देशांत दौरा करते. तेथील विद्यापीठ,प्राणिसंग्रहालये व प्राणिसंरक्षक संस्थांमध्ये व्याख्याने देऊन गोम्बे येथील सहायकांचा पगार तसेच प्रशिक्षणासाठी लागणारा पैसा गोळा करते. चिम्पॅन्झीमित्र असलेली जेन त्यांच्या संरक्षण व संवर्धनासाठी सातत्याने प्रयत्न करीत असते.फ्लो आणि दाढीवाला डेव्हिड तसंच त्यांचे वंशज आज संकटात आहेत.एकोणविसाव्या शतकाच्या अखेरीला त्यांची संख्या एक कोटी होती.आता जगातील चिम्पांझींची संख्या १ लाख ७५ हजार इतकी घसरली आहे.ती साऱ्या आफ्रिकेच्या जंगलातून पसरलेली आहे. झाडं तोडणाऱ्या कंपनी आणि शेतकरी त्यांचे निवासस्थान नष्ट करीत आहेत,तर काही भागात मांसाकरिता त्यांची हत्या केली जात आहे.


चिम्पांझींचे खरे वैरी अवैध शिकार करणारे आहेत.ते ह्या चिम्पांझींची पिलं पकडून सर्कस,कॅबेरेस्ट,प्राणी संग्रहालयात विकतात.जेन म्हणते, "पिलं धरण्याच्या मोहिमेत अथवा त्यांची वाहतूक करताना वीस पिलांपैकी एक पिलू जगतं." तिच्या प्रयत्नांमुळे जागतिक पातळीवर करारनामा होऊन त्यांना संरक्षण मिळविण्यात जेनला यश प्राप्त झालं आहे.परंतु तिला वाटतं,नुसते कायदे-कानून करून हे सारं काही थांबविता येणार नाही.तरी त्यामुळं बरेच नियंत्रण होईल.संशोधन प्रयोगशाळा आणि प्राणिसंग्रहालयातील चिम्पांझींचं राहणीमान उंचावं म्हणून जेन सातत्यानं काळजी वाहते.ती फार गाजावाजा किंवा आक्रोश करीत नाही.परंतु तिच्या शब्दाला मान आहे.


१९८९ साली जीव-औषधी शास्त्रज्ञांपुढे चिम्पॅन्झी आणि मानव यांच्यातील स्वभाव-साम्यांविषयी ती बोलली.तिच्या व्याख्यानानं अमेरिकेतील चिम्पांझींचे शास्त्रज्ञ गेझा टेलेकी प्रभावित होऊन म्हणाले, "पहिल्यांदा आम्हाला जाणीव झाली,की प्रयोगशाळेतील चिम्पॅन्झी उंदरापेक्षा निराळे आहेत." व्याख्यानाच्या शेवटी तेथील श्रोतृवर्ग टाळ्यांचा गजर करीत आनंदानं नाचला,तर कित्येक जणांच्या डोळ्यांत पाणी आलं.


वेळेअभावी आताशा जेन वर्षातून फक्त तीनदा गोम्बेला भेट देते.परंतु त्या भेटीचा तिला खूप आनंद होतो.ती म्हणते,

"चिम्पॅन्झर्झाबरोबर मला एकट्यानं राहणं आवडतं.त्यांच्या सहवासात साऱ्या विवंचनांचा मला विसर पडतो आणि मी मनानं प्रफुल्लित होऊन परतते."


गोम्बे येथील वास्तव्याचं तिसावं वर्ष साजरं करताना जेन म्हणाली,"ज्या चिम्पांझींना मी ओळखते,त्यांनी मला अति आनंद दिला व एक नवीन जीवनदृष्टी दिली. मला त्यांच्याविषयी कृतज्ञता वाटते.मी जगाला दाखवून दिलं,की ते कसे आगळेवेगळे प्राणी आहेत." अन् अशा प्राण्यांचे पुढील पिढीसाठी संरक्षण व जतन झाले पाहिजे. 


समाप्त…!!