नारायणमामा दिवाळीत भाऊबिजेसाठी पुण्याहून आले होते.
बापूंच्या बरोबर ओसरीवर बसून गप्पा मारताना गावाचा आणि वाड्याचा विषय निघाला.नारायणमामांना एखाद्या गोष्टीची उत्सुकता वाटली तर त्याची सविस्तर माहिती ऐकायला आवडत असे,हे माहीत असल्याने बापू त्यांना सविस्तर माहिती सांगत होते -
पेशव्यांच्या काळात ही एक छोटीशी वाडी होती.सगळा भूभाग दुष्काळी होता.शेतकरी कोरडवाहू शेती करून गुजराण करत होते.व्यापारउदीम काहीच नव्हता.
कुठल्याशा लढाईत सरदार विंचुरकरांनी खूप मोठा पराक्रम केला म्हणून पेशव्यांनी त्यांना पाच गावं इनाम दिली.त्यात हा गावसुद्धा दिला.सरदार विंचुरकरांनी आपला प्रतिनिधी म्हणून रघोजी ह्या कर्तबगार माणसाला गावचा पाटील म्हणून नियुक्त केला आणि गाव वसवायला सांगितलं.रघोजीने स्वतःसाठी एक मोठी गढी बांधली आणि तिथून तो गावचा कारभार करू लागला.आजही गावात रघोजी बाबाची गढी आहे.
तिच्यात त्यांचे वंशज राहतात.दसऱ्याच्या दिवशी गावाबाहेरच्या मैदानात शमीच्या वृक्षाची पूजा करायला गाव जमतं तेव्हा अग्रपूजेचा मान आजही गढीवरच्या मंडळींचा असतो.शिवाय दरवर्षी गावात रघोजीबाबांची यात्रासुद्धा मोठ्या दणक्यात साजरी होते.तर,हे रघोजीबाबा मोठे कर्तबगार असावेत.त्यांनी पैठण आणि इतर ठिकाणांहून विणकर आणून इथे वसवले.त्यांना माग काढून दिले.आज हे गाव पैठणीसाठी संपूर्ण राज्यात प्रसिद्ध आहे.रघोजीबाबांनी गुजरात आणि राजस्थानातून व्यापाऱ्यांना निमंत्रण दिलं.ह्या व्यापाऱ्यांच्या पुढच्या पिढ्याही आज गावात समाधानाने राहत आहेत.गावात पाण्याची सोय व्हावी म्हणून गावच्या नगरशेटने गावाबाहेर एक मोठा तलाव बांधला.त्यामुळे गावातल्या जमिनीतल्या पाण्याची पातळी वाढली.आडा-विहिरींना उन्हाळ्यातले काही महिने सोडले तर भरपूर पाणी राहू लागलं.गावाचा व्यापार-उदीम वाढला.इथली रेशमी वस्त्रं शनिवारवाड्यातदेखील जाऊ लागली.गावात पैका आला.साहजिकच इथल्या व्यापाऱ्यांनी,
अंमलदारांनी मोठमोठे वाडे आणि गढ्या बांधल्या.नंतर त्यांच्या पुढच्या पिढ्या नोकरी धंद्यासाठी बाहेरगावी गेल्यामुळे त्यातले बरेच वाडे डागडुजीशिवाय ओसाड पडले.त्याकाळच्या पद्धतीप्रमाणे बऱ्याचशा वाड्यांत बळदं-भुयारं आहेत आणि त्यामुळे त्या संबंधीच्या आख्यायिकाही आहेत.
बापू सांगत होते - "आता आपला वाडा म्हणाल तर तो यशाच्या पहिल्या आईच्या वडिलांकडून माझ्याकडे आला आहे.तो त्यांच्या दोन पिढ्याआधी म्हणजे १८५० सालाच्या सुमारास बांधला गेला असावा." बापूंकडून वाड्याची सविस्तर माहिती ऐकून नारायणमामांच्या शेजारीच कान पाडून ऐकत बसलेल्या यशाच्या मनात वाड्याबद्दल वाटणाऱ्या अभिमानात भरच पडली.यशाला हा बलदंड वाडा मनापासून आवडायचा.बाहेरून दगडी भिंत सगळ्या वाड्याच्या रुंदीला ऐसपैस व्यापणाऱ्या ओट्यानंतर सुरू व्हायची. ओट्याच्या दोन्ही बाजूंना बसण्यासाठी सिमेंटचे कट्टे होते.घराचा मुख्य दरवाजा मजबूत लाकडाचा असून त्यावर उभ्या-आडव्या पट्ट्या मारलेल्या होत्या.त्यांच्या प्रत्येक जोडावर लोखंडी फुलं लावलेली होती. आतमधून दोन्ही बाजूंच्या कोनाड्यात अडसर बसवलेला तर दहा जणांनाही दरवाजा उघडता आला नसता.आत गेल्यावर फरशी टाकलेला चौक होता. त्याच्यावर उजेडासाठी मोठे धारे होते.चौकाच्या वरती थोड्याशा उंचीवर ओसरी होती.तिथे बापूंची बैठक होती.तक्क्याला टेकून चंचीतलं पान खाणाऱ्या बापूंशी सहसा कुळवाडी लोक चौकातच बसून बोलत.शेत कसणारे राधू,विश्वनाथ वरती आले तरी चौकाजवळच्या खांबांना टेकून बसत.बापूंच्या बैठकीवर कुणीच बसत नसत.ओसरीमधून स्वैपाकघरात जाण्यासाठी एक रस्ता देवघरातून जाई तर दुसरा मधल्या बोळीतून स्वैपाकघरात जाई.वाड्याच्या मध्यभागातल्या कोठीच्या आणि बाळंतिणीच्या खोलीनंतरचा भाग मारवाडी कुटुंबाला भाड्याने दिला होता.त्याच्यामागे अंगण.त्यात एका बाजूला आड आणि आंघोळीची प्रशस्त जागा तर दुसऱ्या बाजूला जनावरांचा गोठा आणि कोपऱ्यात संडास.वाड्याच्या बाहेरच्या बाजूला ओट्याला लागूनच एक खोली होती.ती वापरात नव्हती.
नुस्तीच बंद करून ठेवली होती.वाड्याचं वैशिष्ट्य म्हणजे स्वैपाकघरात असलेलं बळद.स्वैपाकघराच्या मध्यभागी ओट्याच्या समोरच बळदात उतरण्यासाठी एक दरवाजा होता.तो उघडला की,जमिनीला एक चौरस खड्डा असून वरती चौकट होती.आत उडी मारून गेलं की,डाव्या बाजूला सुमारे पंधरा फूट लांब,पाच फूट रुंद आणि चार फूट उंचीचं बळद होतं.ते दगडी भिंतींनी बांधलेलं होतं.मात्र बळदाच्या टोकाला एक मातीचा ओटा होता.
कधीकाळी तो शेणाने सारवला जात होता.ओट्यावर तीन रांजण ठेवलेले लांबूनही दिसत.बळदात खूप सटरफटर सामान वर्षानुवर्षं वेगवगळ्या पूर्वजांनी टाकलेलं होतं.यशाची मोठी बहीण मुंबईत राहत होती. तिचे यजमान श्रीकांत ह्यांना यशा का कोण जाणे 'डॅनी' म्हणे.तर हे डॅनी आणि उषाताई एकदा सुट्टीत गावी आले होते तेव्हा बळदात उतरण्याची टूम निघाली होती.
बळदात धन आहे असा कुटुंबातच नाही तर गल्लीतही सगळ्यांचा समज होता.धन मिळालं की,ते कुणाचा तरी बळी घेतं असाही समज होता.त्यामुळे लेकीचा आणि जावयाचा जीव माई धोक्यात घालू इच्छित नव्हत्या.मरो तो पैसा,माझ्या सोन्यासारख्या जावयाचा न् लेकीचा जीव मला धोक्यात घालायचा नाही असा हेका माईंनी चालवला होता.माईंनी अगदी काकुळतीला येऊन विरोध केला होता पण डॅनींनी हट्टच धरला.ते आणि यशा उडी मारून बळदात उतरले. चारपाच वेळा तर सोबत घेतलेला कंदिल विझला तेव्हा उडी मारून ते जिथे उभे होते,तिथेच उभे राहिले.खाली गेल्या पन्नास वर्षांतली हस्तलिखित स्वरूपातली पंचांगं होती,ती त्या दोघांनी वर काढली.पुढे मात्र खूप अडगळ होती.त्या अडगळीखाली साप-विंचू असण्याची शक्यता होती.म्हणून ते पुढे गेले नाहीत.धूळमाखल्या अवस्थेत परत वरती चढून बाहेर आले.
ह्या बळदाच्या दरवाजाच्या फटीतून कितीदा तरी मोठे मोठे साप बाहेर येत असत.माई ह्या बळदाच्या दाराला मोठे,जड लाकडी पाट टेकवून ठेवत.एक पाट बसायला घेत.एका पाटावर पुढे पोथी ठेवून त्या वाचायला बसत.एकदा अशाच माई पोथी वाचत असताना अशोकभाऊचा मित्र शंकर आला.त्याने पाहिलं तर माईंनी पाठ टेकवलेल्या पाटाच्या वरतीच बळदाच्या फटीतून एका काळ्याभोर सापाचं तोंड बाहेर आलं होतं. त्याची जीभ मधूनमधून बाहेर लवलवत होती.शंकरने प्रसंगावधान राखून माईंना झटकन् पाटासकट बळदाच्या दरवाजापासून लांब ओढलं अन् वाडा एका मोठ्या संकटातून सुखरूप बाहेर पडला.नंतर दोनतीन प्रसंगी बळदातून साप आल्यावर तो दरवाजाच माईंनी मातीने लिंपून टाकला.वाड्याच्या बाहेरच्या बाजूला असलेल्या बंद खोलीवर बऱ्याच जणांचं लक्ष होतं.काही दुकानदारांना त्यांच्या दुकानाचा माल ठेवण्यासाठी गोदाम म्हणून वापरायला ती हवी होती.'
जयजवान मित्रमंडळा'ला कॅरम-पत्ते खेळायला पाहिजे होती.पण बापूंनी अशा कुठल्याही कामासाठी ती जागा देण्याचं नाकारलं.
त्यामुळे बरेच दिवस ती खोली कुलूप लावून बंद होती.वाड्याच्या बाहेरच्या बाजूला स्वतंत्र अशी ती जागा असल्याने तशी ती खोली दुर्लक्षितच होती.एक दिवस सकाळी मागच्या अंगणातल्या गोठ्यात पार्वती-लक्ष्मीला चारा घालण्याचं काम माई करत होत्या.सवयीप्रमाणे माईंच्या त्या दोघींशी गप्पा चालू होत्या.
तेवढ्यात रंगूबाई बाबू आणि छोट्या या तिच्या लहान मुलांना घेऊन वाड्याच्या मागच्या बाजूच्या दरवाजाने आत आली.रंगूबाई दोन घरी भांडी घासण्याचं काम करी.तिचा उल्लेख सगळे जण रंगी असाच करीत. रंगी पस्तिशीची,काळीसावळी पण नाकीडोळी नीटस अशी होती.तिच्या नाकात चमकी होती.रंगी म्हणजे आपल्या ऐन तारुण्यात बिनधास्त वागणारी तरुणी असावी.कारण तिच्या दोन्ही मुलांच्या वडिलांची नावं आणि आडनावं वेगवेगळी होती.रंगी आली त्यावेळी माई लक्ष्मीला थोपटत तिच्याशी बोलत होत्या.ती तिच्या गोऱ्ह्याला-नंद्याला चाटत होती नंद्या तिला लाडाने दुशा देत होता."बायो,तुझं पोरावर भारीच प्रेम.पण त्या नादात चारा खाण्याकडे दुर्लक्ष कशाला करतेस?" माई लक्ष्मीकडे कौतुकाने पाहत म्हणत होत्या.रंगीने हे वाक्य ऐकलं.माईंचं आपल्याकडे लक्ष वेधण्यासाठी ती थोडीशी खाकरली."काय गं रंगे,काय काम काढलंस? आणि अगदी पोरांसकट आलीसशी ?"
माईंच्या प्रश्नावर रंगीने तिचं काम सांगितलं.रंगीला गावाबाहेर राहत असलेल्या खोलीच्या मालकाने जागा रिकामी करायला सांगितलं होतं.त्याला वापरायला जागा कमी पडत होती म्हणे.त्यामुळे तिला वाड्याबाहेरची रिकामी आणि बंद असलेली खोली मिळाली तर हवी होती."माई,ह्या दोन पोरांना घरी सोडून दिवसभर कामाला यावं लागतं.माझी सगळी कामं इथली गल्लीतलीच हायत.त्यामुळे माझी चांगली सोय होईल." रंगीला मध्येच थांबवत माईंनी म्हटलं,"बापूंना विचारून सांगते. पण हे बघ रंगे,हा पोरीबाळींनी भरलेला वाडा आहे. थोडं जरी वावगं वागणं लक्षात आलं तर सोन्याला सांगून त्याच दिवशी तुझं सामान खोलीच्या बाहेर फेकून दिलं जाईल." रंगी खाली मान घालून म्हणाली,
"माईसाहेब,गेले ते दिवस.अन् देवळात,देवाच्यासमोर वंगाळ वागनं काय, पन वंगाळ इचार पन कुनी करतं काय ? तुमी बापूंकडं माझ्या पोरांकडं बघून सबुद टाका." "बरं." नंद्याला थोपटत माई म्हणाल्या.
यथावकाश रंगी तिच्या पोरांसकटत्या खोलीत राहायला आली आणि खोलीचं रंगरूपच पालटलं.खोलीची बाहेरची भिंत तिने लिपून काढली.त्याला चुना मारला. छोटंसं अंगण सारवल्याने स्वच्छ दिसू लागलं.बाबू आणि छोट्या गल्लीतल्या पोरांबरोबर भवरा,गोट्या वगैरे खेळायला लागले.ठकूबाई कामावर काही कारणांनी आल्या नाहीत तर रंगी वाड्यावर भांडी घासायला येऊ लागली.महिनापंधरा दिवसांतून एकदा स्वैपाकघर सोडून इतर खोल्या आणि ओसऱ्या शेणाने सारवायचं काम रंगीच नियमित करू लागली.स्वैपाकघर मात्र माई स्वतःच सारवायच्या.रंगी तरतरीत होती.बोलण्यात चतुर होती आणि महत्त्वाकांक्षीदेखील होती.वाड्यातल्या मुली ओट्याच्या कट्ट्यावर गप्पा मारत बसल्या की, आपल्या मोरीत भांडी घासता घासता त्या गप्पांमध्ये रंगीही सामील व्हायची.एक मात्र खरं की,तिच्या पूर्वीच्या आयुष्याबद्दल जे ऐकलं होतं त्याचा मागमूसही आता कुणालाच दिसला नव्हता.
पहाटेच्या अंधारात ती बाहेरच्या मोरीत आंघोळ करून घेई.उजाडताच पोरांना उठवी.मोठा बाबू आता गल्लीतल्याच मराठी मुलांची शाळा नं.२ मध्ये पाचवीच्या वर्गात जाऊ लागला होता. बाबू अभ्यासात यथातथाच होता.त्याचं अभ्यासात लक्ष नव्हतं.
काळ्या रंगाचा आणि पसरट नाकाचा बाबू त्याच्या निस्तेज डोळ्यांनी मख्खपणे तासन्तास कुठे तरी शून्यात बघत राही.छोट्या मात्र तरतरीत होता. गल्लीतली मुलं मारुतीच्या पारावर अभ्यास करत बसली की हा तिथे टक लावून बघत उभा राही. पुढच्याच वर्षी तो पहिलीत जाणार होता पण ऐकून ऐकून त्याचे दहा एके दहापर्यंतचे पाढे पाठ झाले होते. रंगी त्याला जवळ घेऊन म्हणे,"छोट्याला मी लई शिकिवनार ! शिकशील का न्हाई रे छोट्या ?" आईला खूश करण्यासाठी आणि तिच्यावर जास्त प्रभाव टाकण्यासाठी मग छोट्या बे एके बे मोठ्या आवाजात सुरू करायचा.
आईला म्हणायचा,"व्हय आये.म्या लय शिक्नार.यशादादासारकं साळामंदी जानार,विंग्रजी शिक्नार.यस फेस ठेस करनार!"
गावगोत,अष्टगंध प्रकाशन,माधव सावरगांकर
रंगी त्याला आणखीच जवळ ओढून घेत कुरवाळत राही.नवीन शैक्षणिक वर्ष सुरू व्हायची वेळ झाली.रंगी छोट्याचा जन्मदाखला घेऊन जोशी गुरुजींकडे गेली. जोशी गुरुजींना शाळेतल्या सगळ्या मुलांची नावं पाठ होती.बाबूची आई धाकट्या छोट्याला शाळेत नाव घालायला आलेली पाहून चष्म्याच्या वरच्या भागातून रोखून बघत अनुनासिक स्वरात त्यांनी विचारलं, "जन्माचा दाखला कुठाय?"
■■■ अपूर्ण शिल्लक भाग पुढील दोन भागात प्रकाशित होईल.■■■