नवी नोकरी सुरू होण्याआधी सुट्टीवर निघालेला रिकी मेगी हायवेवर अनोळखी व्यक्तीला लिफ्ट देण्याची चूक करतो आणि जिवावरच्या संकटात सापडतो- आऊटबॅक,म्हणजे ऑस्ट्रेलियाच्या विस्तीर्ण आणि निर्जन वाळवंटात मरण्यासाठी सोडून दिलेल्या रिकीची अस्तित्वासाठी दिलेली लढाई.( रिकी मेगी,निर्जन वाळवंटात अस्तित्वाची लढाई,मृत्यू पाहिलेली माणसं,गौरी कानिटकर, समकालीन प्रकाशन )
▶ शुद्धीवर आल्यानंतर रिकीच्या लक्षात येतं की आपण एका खड्ड्यात गाडले गेलो आहोत.आपल्यावर माती आणि ताडपत्री टाकलेली आहे.कुत्री आपलं थडगं उकरताहेत...
पस्तीस वर्षांचा रिकी अंगापिंडाने दणकट असतो.सहा फूट उंच आणि १०० किलो वजन.खड्ड्यातून बाहेर यायला त्याला वेळ लागत नाही;पण बाहेर आल्यावर दिसणारं दृश्य त्याला खचवणारं असतं.दूरवर वाळवंट पसरलेलं असतं.ना कुठे रस्ता दिसत असतो,
ना मनुष्यवस्तीच्या खाणाखुणा.आपण तर बंटिन हायवेवरून हॉल्स क्रीककडे चाललो होतो.अचानक या वाळवंटात आपण कसे काय येऊन पडलो ? त्याच्या डोक्यात सगळा गोंधळ उडतो.
हे नक्कीच एखादं स्वप्न असलं पाहिजे असं त्याला वाटतं.
अन्यथा,एवढ्या भयंकर परिस्थितीत आपण कशाला सापडू? पण नंतर मात्र नेमकं काय घडलंय ते त्याला हळूहळू आठवायला लागतं.हायवेवरून जाताना आपण लिफ्ट दिलेल्या तरुण माणसाने आणि त्याच्या साथीदारांनी आपल्याला गुंगीचं औषध पाजून इथे फेकून दिलंय हे त्याच्या लक्षात येतं.आता पुढे काय याचा विचार न सुचून तो किती तरी वेळ सुन्न बसून राहतो.
ऊन वर यायला लागतं तसा वाळवंटाचा चटका बसायला सुरुवात होते.घशाला कोरड पडते.उन्हात नुसतं बसून राहणं अशक्य असतं.पण चालायला सुरुवात करायची तर ती कोणत्या दिशेने हे रिकीला कुठे माहिती असतं?आपण नेमके कुठे आहोत आणि कुठल्या दिशेने गेल्यावर आपल्याला मदत मिळेल याची त्याला काहीच कल्पना नसते.पण आसपास कुठे तरी वस्ती तर असलीच पाहिजे असं त्याला वाटतं.जवळ नाही,तर थोडं चालल्यावर का होईना,आपल्याला मदत मिळेल आणि आपण लवकरच सुखरूप घरी पोहोचू, अशी तो स्वतःची समजूत काढतो.कुठल्या दिशेने चालावं हे ठरवण्यासाठी तो त्यातल्या त्यात उंच झाडावर चढून जवळपास रस्ता किंवा एखादी वस्ती दिसते का हे बघायचा प्रयत्न करतो;पण त्याला तशी काहीही चिन्हं दिसत नाहीत.दूरपर्यंत खुरट्या झुडपांनी व्यापलेलं सपाट वाळवंट पसरलेलं असतं.
त्याचं मन एकाच वेळी निराशेने आणि आपल्याला अशा निर्जन वाळवंटात फेकून देणाऱ्या लोकांबद्दलच्या संतापाने भरून येतं.या लोकांनी रिकीच्या पायांतले बूटही काढून घेतलेले असतात.दोन-चार वर्षांपूर्वी झालेल्या अपघातात रिकीच्या पायावर अनेक शस्त्रक्रिया कराव्या लागलेल्या असतात.तेव्हापासून लेगब्रेस घालूनच त्याला चालावं लागत असतं.ते लेगब्रेसही त्या चोरट्यांनी लंपास केलेलं असतं.माणसं इतकी निष्ठुर कशी होऊ शकतात याचं आश्चर्य करण्यापलीकडे रिकीच्या हातात काहीही नसतं. नाइलाजाने तो चालायला सुरुवात करतो,केवळ अंदाजानेच पूर्वेची दिशा पकडून.पायांत बूट आणि लेगब्रेस नसताना तापलेल्या मातीत चालणं जीवघेणं असतं.जमिनीवरचे अणकुचीदार दगड आणि खुरटी झुडपं यामुळे लवकरच त्याच्या पायांची चाळण होते. थांबत थांबत,कधी एखादं झाड लागलं तर त्याच्या अपुऱ्या सावलीत विश्रांती घेत रिकी चालत असतो.
तास-दोन तास होत नाहीत तोपर्यंत घसा पूर्ण कोरडा पडून रिकी पाण्यासाठी कासावीस होऊ लागतो. आपल्याकडे काही म्हणजे काही नाही,अगदी पाणीदेखील नाही हे रिकीच्या तेव्हा लक्षात येतं.तब्येत दणकट असल्यामुळे एखाद-दुसरा दिवस न खाता राहता येऊ शकतं,पण पाणी न पिता कसा तग धरणार? आकाशात पाहावं तर पाऊस पडण्याची काही शक्यताही दिसत नाही.शेवटी तहान जेव्हा असह्य होते तेव्हा रिकीसमोर स्वतःची लघवी पिण्याखेरीज काहीही उपाय उरत नाही.आपल्यावर ही काय वेळ आली आहे, या विचाराने त्याला स्वतःचीच दया येते.पण लवकरच तहानेने तो इतका कासावीस होतो की घसा ओला करण्यासाठी काहीही मिळालं तरी चालेल असं त्याला वाटू लागतं.पिण्यासाठी बाटली,भांडं असं काहीच नसल्यामुळे शेवटी स्वतःच्या अंडरवेअरवर लघवी करून ती तोंडात पिळण्याची वेळ रिकीवर येते.
घसा ओला झाल्यावर पुन्हा चालायला सुरुवात होते. रिकीच्या डोक्यात विचारांचं काहूर माजलेलं असतं;पण अजूनही त्या विचारांचा सगळा भर 'आता सुटका होईल की मग' यावरच असतो.हायवेवरची आपली कार कुणाला तरी मिळेल;नव्या नोकरीत रुजू होण्याआधी आपण ज्या मैत्रिणीकडे जाणार होतो ती आपली शोधाशोध करेल,पोलिसात तक्रार दाखल करेल;
आत्तापर्यंत आपला शोध सुरूही झाला असेल. आता कुठल्याही क्षणी आपली सुटका होईल...अशा विचारांत तो चालत असतो. हे विचारच त्याला चालण्याची शक्ती देत असतात.पण लवकरच सूर्य मावळतो आणि त्याच दिवशी सुटका होण्याची आशाही.
रात्री या उघड्या माळरानावर मुक्काम करावा लागणार हे नक्की होतं.दिवसा उन्हाचा जेवढा असह्य चटका बसत असतो तेवढीच असह्य थंडी रात्री पडते,रिकी झोपण्यासाठी झुडपांची दाटी झालेली एक जागा शोधून काढतो आणि अंगावर फांद्या ओढून बसून राहतो. थंडीत झोप येणं शक्यच नसतं.त्यातच मध्यरात्री पावसाला सुरुवात होते.रिकी आनंदाने नाचू लागतो. पोटाला तडस लागेपर्यंत तो पाणी पिऊन घेतो आणि त्या पावसातच झोपी जातो.
सकाळी उठून पुन्हा चाल सुरू होते.पाऊस थांबलेला असतो आणि पावसाचं पाणी रिचवून ती रेताड जमीन पुन्हा कोरडीठक्क पडलेली असते.काही छोट्या डबक्यांमध्ये पाणी साठलेलं रिकीला दिसतं.त्यात तोंड घालून तो शक्य तेवढं पाणी पितो;पण जसजसं ऊन वाढतं,चालून चालून दमणूक होते तसतशी पाण्याची गरज वाढू लागते.घसा ओला करण्यासाठी त्याला पुन्हा कालचाच उपाय अवलंबण्याची वेळ येते.चालून चालून पाय रक्तबंबाळ झालेले असतात.दुसरा दिवसही संपत येतो;पण ना कोणी त्याची सुटका करायला येतं, ना त्याच्या नजरेच्या टप्प्यात एखादी वस्ती दिसते.दुसऱ्या दिवशी रात्री झोपण्यासाठी रिकी थोडे अधिक कष्ट घेऊन फांद्यांचं छत असलेला एक आडोसा तयार करतो.त्याही रात्री मुसळधार पाऊस पडतो आणि वाहून जातो.एवढा पाऊस पडूनही आपल्याकडे पाणी साठवायला काही नाही याचं रिकीला किती वाईट वाटत असेल याची कल्पनाच केलेली बरी.
तिसऱ्या दिवशी सकाळी चालणं सुरू केल्यानंतर रिकीला एक छोटासा चढ लागतो.त्यावर चढून चारही दिशांना वस्तीची किंवा रस्त्याची काही खूण दिसते का हे बघण्यात तो बराच वेळ घालवतो;पण व्यर्थ.पुढचा अर्धा दिवस वाटेमध्ये त्याला छोटी डबकी लागतात.ती चिखलाने भरलेली असली तरी त्यांत पाणीही असतं हे काही कमी नव्हे ! त्यामुळे प्रत्येक डबक्यातलं जमेल तेवढं पाणी पिऊन रिकी मार्गक्रमण करत राहतो.पहिले काही दिवस असेच जातात.दिवसभर मोडक्या पायांनी तंगडतोड करायची,रात्री झोपण्यासाठी चांगला आसरा तयार करायचा,रात्री पाऊस पडला की भरपेट पाणी पिऊन घ्यायचं आणि सकाळी पुन्हा चालायला सुरुवात करायची.त्या काळात रिकीच्या मनात पहिल्यांदा देवाचे विचार येऊ लागतात.रिकीचा देवावर विश्वास असतो, पण त्याचा विचार करण्याची वेळ आजवर त्याच्यावर कधीच आलेली नसते.या वेळी पहिल्यांदाच त्याच्या मनात प्रश्न उमटू लागतात... देव म्हणजे नेमकं काय,तो खरंच आपल्या आसपास आहे का,मी आता कोणत्या संकटातून चाललो आहे हे त्याला कळत असेल का, हे प्रश्न त्याला स्वतःच्या दयनीय परिस्थितीपासून लक्ष विचलित करण्यासाठी उपयोगी पडतात.
चौथ्या पाचव्या दिवशी रिकीची शक्ती कमी होऊ लागते. दुपारी उन्हाचा तडाखा सर्वाधिक असताना त्याचे पाय डगमगायला सुरुवात होते.अनेकदा डोळ्यांसमोर अंधारी येऊन आपण पडतो की काय असं त्याला वाटत असतं; पण तो स्वतःला सावरत,
विश्रांती घेत पुन्हा पुढे चालत स्वतःला खेचत असतो.एकदा मात्र त्याच्या शरीरातले त्राण संपतात आणि तो त्या तापलेल्या मातीवर लोळण घेतो.आपण किती वेळ तिथे पडलेलो आहोत याचं त्याला भान नसतं.थोड्या वेळाने त्याला भास होतो की त्याची जुनी मैत्रीण ज्युली त्याला हाक मारते आहे. त्याला कळत नाही,या वाळवंटात अचानक ज्युली कुठे आली? तो डोळे किलकिले करून बघतो,तर ती त्याला हात देऊन उठवण्याचा प्रयत्न करत असते.'ऊठ,थांबून चालणार नाही.तुला चालत राहायला हवं',असं म्हणत असते.रिकी खरोखर उठून पुन्हा चालू लागतो.आपल्या अंगातली शक्ती पूर्ण संपलेली असताना आपण कसे चालतो आहोत हे त्याचं त्यालाही कळत नाही.हा भास म्हणजे नेमकं काय होतं याचा विचार करण्याची शक्तीही त्याच्याकडे नसते.पण 'जो स्वतःला मदत करतो त्यालाच देवही मदत करतो' हे लहानपणी ऐकलेलं वचन खरं होतं तर, असं त्याच्या मनात येतं. या प्रसंगानंतर तो देवाची खऱ्या अर्थाने प्रार्थना करतो.तो म्हणतो, 'देवा, मला मदत कर.मी तुला कुठलाही चमत्कार घडवायला सांगत नाहीये.फक्त मी जगावं असं या जगात कुणाला तरी वाटतं आहे ना,एवढं मला सांग.'
अंगातली शक्ती संपून आता दिवस उलटलेले असतात. आता आपली सुटका कशी होईल,या विचारापेक्षा आपल्याला पाणी कसं मिळेल,या विचाराने रिकीचं मन व्यापलेलं असतं.कुठेही थोडी ओली जमीन दिसली की त्याखाली खणून तो पाण्याचे काही थेंब मिळवण्याचा प्रयत्न करत असतो,झाडांच्या पानांवरचा ओलावा चाटत असतो.चार-पाच दिवसांच्या पायपिटीनंतर त्याला पायाखालची जमीन बदललेली जाणवू लागते. जमिनीतला ओलावा वाढलेला असतो.त्याला छोटी छोटी डबकी दिसू लागतात आणि त्या डबक्यांचा माग रिकीला चक्क एका छोट्या नदीपाशी घेऊन जातो. स्वच्छ पाण्याने भरलेली वाहती नदी! एवढं पाणी पाहून त्याचा पहिला प्रतिसाद असतो,की आता आपल्याला आणखी काहीही मिळालं नाही तरी चालेल.त्यानंतर कित्येक तास तो नदीत डुंबून पाणी पीत राहतो.आता नदीच्या किनाऱ्यावरून तिच्या प्रवाहांसोबतच पुढे चालत राहायचं ठरवतो.तापलेल्या जमिनीवरून, काट्याकुट्यांतून चालण्यापेक्षा ते किती तरी चांगले असे त्याला वाटतं पण प्रत्यक्षात तो चालायला सुरुवात करतो तेव्हा मात्र लक्षात येतं.की जमिनीवर काटेकुटे आणि दगड असतील तर नदीचं पात्रही कमी धोकादायक नाही.त्यातून चालणंही रिकीच्या पावलांसाठी तितकंच प्रासदायक ठरतं.पण जमेल तेवढं पोहत जमेल तेवढं पाण्याच्या प्रवाहासोबत वाहत रिकी पुढे जात राहतो.पाण्याजवळ असण्याचा दुसरा त्रास असतो तो डास आणि पिसवांचा.त्यांच्या झुंडीच्या झुंडी रिकीच्या अंगाभोवती घोंघावत त्याला फोडून काढायला सुरुवात करतात.
नदीच्या एका वळणावर रिकीला पहिल्यांदाच काही मानवनिर्मित खुणा दिसतात.ती एक पवनचक्की असते. ज्याअर्थी इथे पवनचक्की उभारलेली आहे त्याअर्थी इथे कोणी ना कोणी तरी येत असणार.आजच नव्हे,पण किमान एक-दोन दिवसांत कोणी तरी नक्की इथे येईल आणि आपली सुटका होईल अशी रिकीला आशा वाटते.त्यामुळे ती रात्र तो या पवनचक्कीपाशी काढायचं ठरवतो.आपण पवनचक्कीच्या पात्यांखालच्या प्लॅटफॉर्मवर बसलो तर वरून लांबवरचं दृश्य दिसेल आणि डासांपासून सुटका होईल,या विचाराने रिकी तिथे जाऊन बसतो.डास आणि पिसवांचा त्रास थोडा कमी होतो पण पूर्ण संपत नाही.ती रात्र तो तिथेच काढतो. दुसऱ्या दिवशी वरून त्याला पवनचक्कीची डझनभर पाती पडलेली दिसतात.त्याच्या डोक्यात येतं,त्यांचा उपयोग करून रात्रीसाठी आसरा तयार करावा.रात्रीचा पाऊस आणि डासांपासून सुटका करून घेता आली तर या नदीशेजारी राहण्यासारखं सुख नाही,असा विचार तो करतो.चार दिवस मेहनत करून तो पवनचक्कीच्या पात्यांपासून एक छोटं खोपटं तयार करतो.रात्री मुसळधार लागली तर ते खोपटं गळत असतं,पण तरीही मिळालेला आसराही रिकीसाठी लाख मोलाचा असतो. या खोपटात तो बरेच दिवस काढतो.त्या काळात तिथे जोरदार पाऊस पडतो.त्यामुळे त्या काळात सुटकेची शक्यता अशी नसतेच.पण पाऊस कमी झाल्यावरही तिथे कोणी फिरकत नाही म्हटल्यावर आता पुन्हा पुढे जाण्याची वेळ आली आहे,असं रिकी स्वतःला पटवतो आणि चालू लागतो.निघण्याआधी पवनचक्क्यांच्या पात्यांपासून SOS चं चिन्ह काढून ठेवायला तो विसरत नाही.
मधल्या काळात त्याच्या शरीराला थोडी विश्रांती मिळालेली असते,नदीच्या किनारी उगवलेलं कोवळं गवत खायला मिळालेलं असतं;पण त्यामुळे उलट रिकीच्या पोटातली भुकेची भावना वाढीस लागते.
◆◆◆ अपूर्ण ■■■