माणसांपैकी एखाद्या दर्यावर्दी प्रवाशानं एखाद्या निर्मनुष्य बेटावर पोचावं,तशा झुडूप-मुंग्या महासमाज क्षेत्रात पोचल्या.नुकत्याच उपासमारीला सामोरं जाणाऱ्या वारुळाला अमर्याद अन्नाचा खजिनाच सापडला.आणि सुरुवातीला तर झुडूप-वारुळाला इतर वारुळांपासून स्पर्धेचाही त्रास नव्हता.पण माणसांनी झाडांवरून खांद्याच्या उंचीवर लोंबणारी फळं तोडावी, तितकं मुंग्यांना अन्न धरणं सोपं नव्हतं.मुंग्यांच्या भक्ष्याला वेग असतो.त्यांची शरीरं,
त्यांची वागणूक,हे सगळं कोट्यवधी वर्षांच्या मुंग्यांशी आलेल्या संबंधातून उत्क्रांत झालेलं असतं.यातली काही बचावतंत्रं तर माणसांना अद्भुत वाटणारी असतात.
झुडूप-मुंग्यांना ऑरिबॅटिड कोळी भेटले.खरं तर ते कोळी आणि वारूळ यांच्या संकरातून घडल्यासारखे जीव होते.त्यांना कठीण कवचं होती,मुंग्यांच्या जबड्यांनी सहज फोडता न येणारी.
सहस्रपाद किड्यांची वेगळीच कहाणी होती.ते सापडले,पकडता आले,मारता आले,तर भरपूर अन्न मिळायचं.पण त्यांच्या शरीरांच्या प्रत्येक मण्याला चिलखतासारखी कवचं असतात.ह्या कवचांचे पत्रे मागच्या पुढच्या कवचांना बिजागऱ्यांसारख्या सांध्यांनी जोडलेले असतात.त्यामुळे लवचीक असूनही हे जीव चिलखतधारी असतात.बरं, त्यांच्यावर हल्ला होताच ते सायनाईड आणि इतर विषारी पदार्थ शत्रूवर फवारतात ! अशा त-हेनं प्रत्येक कीटक,
अळ्या,किडे आपापली शस्त्रास्त्रं घेऊन हल्ल्यांना तोंड देतात.
मुंग्यांचंच अन्न खाणारे मुंग्यांचे मुख्य स्पर्धक म्हणजे जमिनीवर वावरणारे भुंगे.यांना कवचही असतं,ते विषही फवारतात,मुंग्यांचे तुकडे तोडण्याइतके त्यांचे जबडेही मजबूत असतात,आणि वेळप्रसंगी ते पंख पसरून उडूनही जाऊ शकतात.
तर विषारी नसलेलं.वेगानं पळू न शकणार,जबड्यांनी चावे न घेणारं,आकारानं मोठं,असं अन्न शोधत झुडूप-मुंग्या नव्या क्षेत्रात वावरू लागल्या.खरं तर आसपास संख्येनं भरपूर असायच्या सूत्रकृमी.पण त्या इतक्या लहान असायच्या की मुंग्यांना त्यांना खायची इच्छा होत नसे.वाघ जसा झुरळं किंवा चिचंद्रयांची शिकार करत नाही,तसंच हे.सुरवंट हे मात्र मुंग्यांचं आवडतं अन्न असत.
तर अन्न शोधत झुडूप-कामकरी मुंग्या फिरायच्या.अन्न सापडलं तर रस्त्यावर फेरोमेन-संदेश सोडत वारुळाकडे परतायच्या.भेटणाऱ्या प्रत्येक झुडूप-मुंगीला शिंगांनी स्पर्श करून "चल, अन्न" असा संदेश द्यायच्या.आणि पुरेसं संख्याबळ जमा झालं की भक्ष्य पकडून वारुळाकडे ओढायला सुरुवात करायच्या.
एकदा झुडूप-मुंग्यांना जमिनीत बिळं करून राहणाऱ्या एका नाकतोड्याचं पिल्लू सापडलं.जरी त्या पिल्लाची वाढ पूर्ण झालेली नव्हती,तरी मुंग्यांशी त्याचं प्रमाण माणसांशी गाईचं असतं,तसं होतं.त्याला मारायला डझनभर मुंग्या लागल्या.काहींनी त्याचे पाय धरून ताणले,तर काहींनी त्या ताणण्यानं जिथून चिलखत हटलं त्या भागांना दंश केले,आणि नाकतोडा-पिल्लू मारलं.असंच एका सुरवंटाला मारायला शंभरेक कामकरी आणि वीसेक सैनिक मुंग्या लागल्या.मुंग्यांना सुरवंट कसा वाटला,तर माणसांना देवमासा वाटावा, तसा ! बरं,अन्न सापडलं आणि घरी नेलं,इतकं सरळही नेहमी घडत नसे.एकदा एक मेलेला सरडा सापडला. संपूर्ण वारुळाचं पोट काही दिवस सुखानं भरेल,असं हे घबाड होतं.काही अभिजन-मुंग्यांना ते सापडलं,आणि लवकरच शेकडो इतर कामकरी मुंग्याही गोळा झाल्या.
पण याच वेळी काही आग्या-मुंग्यांच्या गस्ती टोळ्याही येऊन पोचल्या.आग्या मुंग्या चांगल्या लढायच्या, विशेषतः गटागटांनी.त्या झपाट्यानं येतात,आणि गटागटानं हल्ला करतात.तर लवकरच मेलेल्या सरड्याभोवती धुमश्चक्री सुरू झाली.दोन्ही प्रकारच्या मुंग्या कुमक बोलावत होत्या,आणि सरडा-परिसरात दोन्ही प्रकारच्या मुंग्यांचा खच पडत होता.अखेर झुडूप-मुंग्या जिंकल्या,कारण सरडा त्यांच्या वारुळाजवळ होता,आणि आग्या-वारुळाच्या दूर.
आणि झुडूप-मुंग्यांना खूपशा सैनिकांनाही बोलवावं लागलं,वारूळ लहानखुरं,कुपोषित असताना त्यात सैनिक-मुंग्याच नव्हत्या.भरपूर अन्न मिळाल्यावर मात्र राणी-मुंगीनं सैनिकांनाही जन्म दिला होता.
प्रत्येक सैनिक-मुंगी जोरदार युद्ध करू शकत असे.तिचं शरीर मोठं आणि बळकट असे.डोकं मोठं आणि बदामाच्या आकाराचं असे.शत्रूचं चायटिन-चिलखत फोडण्याइतके जबडे बळकट असत,बारीक आणि तेज दातांनी भरलेले.जबड्याच्या सर्वांत पुढच्या भागातला दात कट्यारीसारखा मोठा असे.यानं भक्ष्य किंवा शत्रूला धरून ठेवता येत असे.शरीराचे सांधे चिलखती काट्यांनी संरक्षित असत.आणि सैनिकांचे मेंदू नेहमी युद्धसज्ज असत.शत्रू भेटला,की त्याला चावतानाच सैनिक मुंग्या हवेत "धोका!" असं सांगणारे फेरोमोन्स फवारत.शत्रू सवालाला जबाब देणारा असला,
तर हे धोका-फेरोमोन्स शरीरं जास्त प्रमाणात घडवायची.बरं,सैनिक मुंग्या धोका-फेरोमोन क्षीण प्रमाणात असलं तरी ओळखायच्या.यामुळे एका सैनिक-मुंगीला विरोध झाला,तर लवकरच अनेक सैनिक मुंग्या तिच्या मदतीला यायच्या.धोका संदेश मिळताच सैनिक मुंग्या सर्व परक्या वस्तूंवर हल्ला चढवायच्या. "मेलो तरी बेहत्तर" अशा वृत्तीनं सैनिक मुंग्या लढायच्या.एकदा का झुडूप-वारूळ वेगानं वाढायला लागलं,की त्याला सैन्य उभारायची गरज भासायला लागायची. संख्येनं नगण्य असतानाच जर वारुळानं सैन्यबळ उभं करायचा प्रयत्न केला असता,तर ते जड गेलं असतं. मर्यादित अन्नपुरवठा वाढवण्याची गरज टाळून सैनिक उभारणं,यानं शत्रूना आमंत्रण दिलं गेलं असतं.शत्रूशी लढायला इतकी कमी सेना घडली असती,की पूर्ण वारूळच सहज नष्ट झालं असतं.त्यामुळे आधी अन्नपुरवठा वाढवायला कामकरी पैदा करून मगच सेनेचा विचार करता आला.अर्थात,सुरुवातीला संख्या कमी,सैन्य नाही,या स्थितीत जर हल्ला झाला असता,तरी वारूळ संपलं असतं.पण तो धोका पत्करूनही कामकरी वाढवणंच शहाणपणाचं होतं.नंतरही सैनिक किती उभारायचे,आणि कामकरी किती,हे सतत ठरवावं लागायचं.
जास्त सैन्य उभारलं, तर अन्न कमी पडून वाढ खुंटणार.दुसऱ्या टोकाला सैन्य कमी पडलं,तर शत्रूला सहज वाट मोकळी होणार,पण अनेक पिढ्यांच्या उत्क्रांतीतून वारुळाचा आकार आणि सैनिक कामकरी प्रमाणाचं गणित वारूळ सोडवू शकत होतं.जसं,एकूण संख्या दोनशेच्या जवळ पोचल्यावरच पहिली सैनिक-मुंगी जन्मली.नंतरही संख्या हजाराजवळ जाईपर्यंत सैनिक-मुंग्या घडल्या नाहीत.उन्हाळ्यात जेव्हा वारुळाची प्रजा दहा हजाराला पोचली.तेव्हा मात्र पाचशे सैनिकांची फौज घडली होती.आता वारूळ स्वतःचा जीव वाचवून वाढण्याइतकं सबळ झालं होतं. झाड-देवांचा कोप,किंवा आर्माडिलोंसारखे मुंग्या खाणारे प्राणी येणं,हे सोडता सर्व हल्ले वारूळ परतवून लावू शकत होतं.वारूळ उत्कर्षाच्या या अवस्थेला पोचलं तोपर्यंत त्याचं क्षेत्रही वाढलं होतं.थोडंथोडं करत कामकरी-मुंग्या महासमाज-क्षेत्रात दूरदूर जाऊ लागल्या होत्या.आणि सोबतच वारुळाची एकूण बुद्धीही वाढत होती.ही बुद्धी एकत्रित नव्हती.ती अनेक मुंग्यांमध्ये विखुरलेली होती.काही मुंग्यांना अन्नक्षेत्राचा एक भाग माहीत असायचा,तर काहींना दुसरा,काहींना पाऊस पडताना काय करणं योग्य ठरलं होतं ते आठवायचं,तर काहींना संगोपन दालनं कशी चालवायची ते माहीत असायचं.माणसांच्या मेंदूंमध्ये वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळी बुद्धीची क्षेत्रं असतात,तसाच हाही प्रकार होता.फक्त बाहेरून पाहणाऱ्याला सुट्या मुंग्या दिसायच्या,आणि त्यांच्यातून घडलेला महाप्राणी मात्र उशिरानं लक्षात यायचा.
महाप्राण्याचे वेगवेगळे भाग फेरोमोन संदेशांमधून एकमेकांशी बोलायचे,आणि परिस्थिती पाहून, तिच्याबद्दल विचार करून कृती केली जायची.एकूण पाहता महाप्राणी सुट्या भागांच्या बुद्धींच्या बेरजेपेक्षा बराच जास्त बुद्धिमान होता.भरभराट भोगत असतानाच झुडूप-वारुळाला त्या भरभराटीची किंमतही समजायला लागली.पहिली अडचण जाणवली ती जागेची.
प्रजेची संख्या वाढायला लागली,आणि मूळच्या वारुळात दाटी व्हायला लागली.वारूळ वाढवायला कामकरी-मुंग्या धडपडायला लागल्या.जबड्यात मावेल तेवढा मातीचा कण उचलून वर उघड्यावर नेऊन टाकायला लागल्या.पण जमीन जास्तच भुसभुशीत होती.जराशाही धक्क्यानं छत ढासळायचं.झुडपांची मुळंही वारूळ वाढवण्यात अडथळे आणायची.आणि मुख्य म्हणजे,झुडपांच्या दाट सावलीमुळे मूळ वारुळाजवळ अन्न कमी मिळायचं.अखेर काही मुंग्या बाहेर एखादी मोठ्या वारुळासाठी योग्य जागा मिळते का,ते पाहायला लागल्या.
महासमाज क्षेत्रात जुन्या भुयार-बोगद्यांचं जंजाळ होतं. त्या जंजाळाची वर्षभरात काही पडझडही झाली होती. काही दारं बुजली होती.माती ढासळून काही भुयारं भरून गेली होती.पण झुडूप-मुंग्यांना जंजाळाचे भाग सापडत असायचे.काही भाग नव्या घरासाठी योग्य आहेत,असंही काहींना वाटायचं,मग त्या परत येताना नवी जागा आणि वारूळ यांना जोडणारी वाट फेरोमोन्सनी रेखायच्या.जर भरपूर मुंग्यांना नवी जागा आवडली असेल,तर त्या जागेचा रस्ता भरपूर सुगंधित व्हायचा.जर एखादुसऱ्या मुंगीलाच नवी जागा आवडली असेल,तर वाटेवरच्या खुणा तुटक आणि अस्पष्ट असायच्या.तर अशा त-हेनं वेगवेगळ्या नव्या जागांसाठी मुंग्यांमध्ये मतदान व्हायचं.ज्या जागेला सर्वांत जास्त मतं,
तिच्याकडे जाणारी वाट फेरोमोन-खुणांनी ठळक व्हायची.अखेर उन्हाळा संपल्यावर दोनेक महिन्यांनी नवी जागा शोधणाऱ्यांना एक अत्यंत आकर्षक जागा सापडली.त्या जागेच्या जुन्या महासमाज-जंजाळाचं दार माती कोसळून बंद झालं होतं.
संशोधक-मुंग्यांनी ते मोकळं केलं,आणि आतली रचना तपासली.ती त्यांना आवडून त्या लगबगीनं पुन्हा वारूळ गाठून इतर मुंग्यांना बोलावून घेऊ लागल्या.लवकरच अनेक मुंग्या जाऊन जाऊन वाटेवरच्या फेरोमोन-खुणा रेखीव झाल्या. वारुळाच्या विखुरलेल्या मेंदूनं निर्णय घेतला,"ही जागा छान आहे!" लवकरच मीटरभर खोल उभं भुयार,दर थोड्या अंतरावर आडवी भुयारं,
त्यांच्यात दालनं,असं वारूळ साफ झालं.एखाद्या सापाचा सांगाडा उभा ठेवून पाहावा,तसं हे भूमिगत वारूळ दिसत होतं.उभा कणा आणि आडव्या बरगड्या.
वारूळ बदलण्याच्या प्रत्येक टप्प्यावर कोणत्या ना कोणत्या अभिजन-मुंगीनं पुढाकार घेतला होता. खोदकामाला कामकरी मुंग्या गोळा करायला सुरुवात एखादी अभिजन-मुंगी करायची,
आणि मग इतर मुंग्या कामगार-भरतीला लागायच्या.
एखादा बोगदा एखादी अभिजन मुंगी साफ करायला घ्यायची,आणि मग इतर मुंग्या मदतीला धावून यायच्या.एकूणच कोणतंही नवं काम करायला घेणं,एखाद्या कामाचा वेग वाढवणं, सगळं अभिजन-मुंग्यांच्या पुढाकारानं केलं जायचं.
तर नवी जागा साफसूफ करून घेतल्यावर घर बदलण्याचा कार्यक्रम सुरू झाला.सगळी वाहतूक दिवसाढवळ्या संपवणं निकडीचं होतं,कारण रात्री वावरणाऱ्या शिकाऱ्यांपासून वाचण्याचा झुडूप-मुंग्यांना अनुभव नव्हता.आणि रात्री अधेमधे असण्यात नष्ट होण्याचा धोका होता.सुरुवातीला हलल्या आळशी मुंग्यांना वाहणाऱ्या कामकरी मुंग्या.हो, काम सुरू करणाऱ्या अभिजन-मुंग्या असतात,तशाच आळशी मुंग्याही असतात घाबरट,आणि बऱ्याच टोचणीनंतरच हालचाल करणाऱ्या! तर कामकरी-मुंग्या आळशी-मुंग्यांच्या जबड्यांना जबड्यानं धरून हलकेच ओढायच्या.यानं आळशी मुंग्या आणिकच शांत व्हायच्या.यानंतर आळशी मुंग्यांची शिंगं आणि त्यांचे पाय शरीरालगत सरकवले जायचे,मुंग्या कोषांत असताना असतात तसे. मग कामकरी-मुंगी हे गाठोडं पाठीवर घ्यायची,आणि नव्या वारुळाकडे चालायला सुरुवात करायची.
कोष,अळ्या यांना जबड्यात धरून नेलं जातं,पण नरमाईन,अंडीही अशीच तोंडात धरून नेली जातात. एकूण घर बदलण्यातला मोठा भाग वारुळाच्या आजी आणि माजी सभासदांच्या वाहतुकीचा असतो.यांत सगळ्यात महत्त्वाची सभासद म्हणजे राणी-मुंगी. आपलं अंड्यांनी भरलेलं पोट सांभाळत,संथ गतीनं, घाबरत,राणी हलू लागली.तिच्या अगदी जवळ दाईचं काम करणाऱ्या मुंग्यांचा घोळका होता,राणी इतरांच्या दृष्टीला पडू नये इतका दाट.यांपैकी काही राणीचा जबडा धरून तिला कोणीकडे जायचं ते खुणावत होत्या.इतर सगळ्या मात्र तिला ब्लॅक कॅट कमांडोंची झेड-सुरक्षा देत होत्या.तिचा आकार प्रचंड होता. तिचं वजन कामकऱ्यांच्या जथ्यालाही न पेलण्याइतकं जास्त होतं.पण तिचा संथ प्रवास हा नवं वारूळ गाठण्याचा सर्वांत महत्त्वाचा भाग होता.
एखाद्या सरड्यानं किंवा पक्ष्यानं तिला खायचा प्रयत्न केला असता,कारण ती छान भक्ष्य होती.एखाद्या शत्रू-मुंग्यांच्या सैन्यानंही असा हल्ला केला असता.असा एखादा प्रयत्न यशस्वी झाला असता,तर झुडूप वारुळाची ती मृत्युघंटा ठरली असती.
मुळात राण्या फारदा एकीकडून दुसरीकडे जात नाहीत. झुडूप-राणीचा हा प्रवास मात्र सुरक्षित आणि सुखाचा झाला.अंधार पडायच्या आत राणी आणि तिची बहुतेक प्रजा नव्या जागी स्थिरावली.काही शूर मुंग्या अजूनही फेरोमोन-वाटांवरून मागेपुढे करत होत्या,पण मुख्य काम झालं होतं.गेल्याच वर्षी मरू घातलेलं झुडूप-वारूळ आता या मुंग्यांच्या प्रजातींमधल्या मोठ्यात मोठ्या आकाराजवळ पोचलं होतं.
महासमाज क्षेत्र त्यांना झाड-देवाच्या कृपेनं मिळालं.ते पूर्णपणे व्यापणं झुडूप-वारुळाला शक्य नव्हतं.पण घुबड तलाव परिसरातल्या कोणत्याही वारुळापेक्षा झुडूप-वारूळ मोठं झालं होतं.पुढे काय होणार ते स्पष्ट होतं.पुढचा वसंत सुरू झाला, आणि मूळ वारुळापासून सर्वांत दूर जाणाऱ्या झुडूप-मुंग्यांना परक्या मुंग्या भेटू लागल्या.दर भेटीनंतर दोन्ही बाजूंच्या मुंग्या पुन्हा आपापल्या घरांकडे पळायच्या.झुडूप-मुंग्या तर फारच आश्चर्यचकित असायच्या,कारण त्यांना आपल्यासारख्या पण वेगळा वारूळ-वास असलेल्या मुंग्या माहीतच नव्हत्या !
नंतरच्या काही दिवसांमध्ये झुडूप वारुळाच्या मुंग्यांनी शत्रू दिसले होते त्या भागातली गस्त वाढवली.त्या बाजूला जाणाऱ्या वाटांवर जास्तजास्त फेरोमोन-खुणा सोडल्या गेल्या,नेमकं हेच सगळं शत्रूच्या बाजूनंही होत होतं.दोनही वारुळं तयारीत होती.
वारुळ पुराण',माधव गाडगीळ',ई.ओ.विल्सन,अनुवाद - नंदा खरे,मनोविकास प्रकाशन
मग सामने होऊ लागले.कामकरी मुंग्या पोटं फुगवून, पाय ताठ करून सैनिक असल्याचा आव आणू लागल्या.खड्या-काड्यांवर चढून उंची वाढवू लागल्या. यामागनं खऱ्या सैनिक मुंग्या आल्या.मिरवणं, एकमेकींभोवती वर्तुळं रेखणं,धक्के देणं,सगळे स्पर्धा सामन्यांमधले प्रकार होऊ लागले.दोन्ही बाजूंनी थेट हल्ल्याची तयारी मात्र नव्हती. दुसऱ्या बाजूच्या मिरवण्यातून कुठे कमकुवतपणा दिसतो का,यावर मात्र दोन्ही बाजू लक्ष ठेवून होत्या.एक अदृश्य सीमा आखली गेली,म्हणू या.याला फार महत्त्व नव्हतं.झुडूप-वारुळाची राणी तरुण होती.वारुळातली मुंग्यांची संख्या सरासरी वारुळांमधल्या संख्येपेक्षा जास्त होती.वारुळाचं क्षेत्र सुपीक होतं.ताकद,टिकाऊपणा यांना कोणता तात्कालिक धोका नव्हता.नंतरच्या उन्हाळ्यात झुडूप-वारूळ राजकुमारी आणि नर पैदा करू लागलं.योग्य वेळी,योग्य हवामानात राजकुमारी आणि नर उड्डाण करून संभोग करू लागले.मूळ क्षेत्राबाहेरही झुडूप-वारुळातल्या राजकुमारी पोचून,राण्या होऊन वारुळं वसवू लागल्या. झुडूप-वारूळ या महाप्राण्याला पिल्लं व्हायला लागली. उत्क्रांतीच्या खेळात झुडूप-वारूळ यशस्वी ठरलं.
वारुळाच्या एकत्रित मनाला आपण कसे घडलो, कशामुळे यशस्वी झालो,हे पूर्णपणे कळत नव्हतं.सर्वांत वयस्क मुंग्यांना पूर्वीचे शत्रू आठवत होते.ते एकाएकी मेले,नाहीसे झाले,हे आठवत होतं.एक सुपीक आणि विस्तृत क्षेत्र आपल्याला एकाएकी मिळालं,हे स्मरत होतं.या वयस्क मुंग्यांनी त्यांच्या तरुण सहकाऱ्यांसोबत हे क्षेत्र तपासलं होतं.त्या सगळ्यांच्या स्मरणात मिळून क्षेत्राचा एक नकाशाही होता.त्यांना जर हलत्या झाड-देवांचं अस्तित्व जाणवलं असतं,समजलं असतं, तर त्यांना आपल्या सौभाग्याचं कारण कळलं असतं. वादळं,वणवे,तसे झाड-देवही झुडूप-वारुळाला अनाकलनीय होते.
— समाप्त—