शांतता,समता,वाढ,सगळं असूनही महासमाज खऱ्या अर्थानं निरोगी नव्हता.तो आपल्या परिसरातल्या निसर्गाशी जुळून,
संतुलित झालेला नव्हता.त्याची प्रचंड, घनदाट प्रजा परिसराला झेपत नव्हती.बदल-मुंग्यांच्या क्षेत्रातल्या काही वनस्पती,काही प्राणी कमी व्हायला लागले.काही तर नष्टच झाले.
सर्वांत आधी संपल्या बदल-मुंग्यांसारख्या इतर मुंग्या; ओढा-वारुळ,पायवाट-वारूळ पद्धतीनं जगणाऱ्या. जितकी एखादी जीवजात बदल-मुंग्यांना जवळची, तितकी ती झपाट्यानं नष्ट झाली.बदल-मुंग्यांसारखंच अन्न खाणाऱ्या मुंग्यांची उपासमार व्हायला लागली. बदल-मुंग्यांच्या संख्येमुळे त्या अन्नावर आधी हात मारायच्या;आणि तसलंच अन्न खाणाऱ्यांना अन्न कमी मिळायचं.
त्यांच्या गस्ती मुंग्या,मावा किड्यांना दोहणाऱ्या मुंग्या यांची बदल-मुंग्यांशी भांडणं व्हायची.आणि संख्याबळामुळे नेहमी बदल-मुंग्याच जिंकायच्या.
नोकोबी परिसरातले मुंग्या खाणारे जीवही त्रासात होते.कोळी,
बीटल,भुंगे,हे मुंग्या खाणारे जीव आता मुंग्यांच्या संख्येमुळे स्वतःच भक्ष्य व्हायला लागले.त्यांची संख्या घटल्यानं बदल-मुंग्यांची संख्या अधिकच वेगानं वाढू लागली.
पूर्वी साध्या मुंग्या जे परिसर धोकादायक समजत असत,तिथे जायलाही बदल-मुंग्या तयार व्हायला लागल्या.त्यांची अनेक राणुकली,त्या राणुकल्यांची अंडी आणि अळ्या,साऱ्यांना भरपूर अन्न लागायचं.अन्न कमवायचं दडपण वाढल्यानं बदल-मुंग्या नको तिथे घुसखोरी करू लागल्या.एरवी मुंग्या पाण्याच्या फार जवळ जात नसत,कारण तो परिसर धोकादायक असायचा.
मुंग्या झाडांवर फार चढत नसत,कारण तिथे फारसं अन्न मिळायचं नाही.आता मात्र बदल-मुंग्या पाण्याजवळही जायला लागल्या,
आणि झाडांवरही. एरवी मुंग्यांपासनं सुरक्षित असलेले झाडांवरचे जीवही आता धोक्यात आले.सुरवंट,नाकतोडे,माश्यांच्या अळ्या, असे अनेक प्रकारचे कीटक आता अडचणीत आले. आणि आणखीनच महत्त्वाचं म्हणजे,वनस्पतीचं परागीकरण करणारे अनेक जीव घाबरून दुसरीकडे गेले.पाकोळ्या,
फुलपाखरं,गांधीलमाशा,मधमाशा, चतुर, भुंगे,अशा अनेक प्रकारांमधल्या अनेक प्रजाती दूर गेल्या.एकूण घुबड तलाव,नोकोबी परिसर जास्तजास्त एकसुरी होत गेला.
कीटकांमधली पूर्वीची विविधता रोडावली.
उरलं कोण? अत्यंत जाड कवचांचे भुंगे वाचले.गोमा वाचल्या.
काही प्रकारची गांडुळं वाचली.अनेक अगदी लहान,किंवा खूप वेगवान कोळी आणि कीटक वाचले. शहरांमध्ये चिमण्या,पारवे आणि उंदीर-घुशी टिकून राहतात तसा हा प्रकार.चवीला वाईट,किंवा पकडायला कठीण असे जीव शिल्लक राहिले.
काही जीवांना तर महासमाज,त्याचं साम्राज्य,हे सगळं आवडतही होतं.मावा किड्यांचे अनेक प्रकार, वनस्पतींना छिद्रं पाडून आणि त्यांचा रस शोषून मुंग्यांना आवडणारी विष्ठा टाकणारे जीव,यांना तर बदल-मुंग्यांनी पाळूनच ठेवलं! त्यांना मुंग्यांचं संरक्षण मिळालं.या जीवांमध्ये अंडी देणाऱ्या गांधीलमाश्या,त्यांना खाणारे लेडीबर्ड प्रकारचे भुंगे,यांना मुंग्यांनी हाकलून लावलं. माणसं जसं गाईगुरांना सांभाळतात,वाघ तरसांपासून संरक्षण देतात,तसे ही जीव बदल-मुंग्यांच्या संरक्षणात राहायला लागले.यानं वनस्पतींचं मात्र बरंच नुकसान व्हायला लागलं; कारण हे पाळीव जीव रस शोषणारे होते.
फारशी स्पर्धा उरली नसल्यानं बदल-मुंग्या संख्येनं वाढू लागल्या.
त्या जास्त क्षेत्रही व्यापत होत्या,आणि क्षेत्रातली मुंग्यांची दाटीही वाढत होती.पूर्वी जी मोठ्या क्षेत्रात विखुरलेली वारुळं असायची,
त्याऐवजी सर्व भाग एका वारुळाच्या सलग जंजाळानं व्यापला गेला होता. आणि वारुळं खादाड असतात.एखाद्या घनदाट वस्तीच्या महानगराला जसं बाहेरनं अन्न मिळणं आवश्यक असतं,तसं आता बदल-मुंग्यांच्या क्षेत्रात व्हायला लागलं.उन्हाळा उतरणीला लागला,आणि महासमाज अडखळू लागला.त्याचा परिसर,त्या परिसरातली एकमेकांना अन्न पुरवणारी जीवसृष्टी कोमेजायला लागली.अनेक वनस्पती त्यांचा रस शोषला गेल्यानं इतक्या दुबळ्या झाल्या,की त्यांना फळं-बिया घडवता येईनात.ससे,उंदीर,चिचंद्रया,खारी,बदल-मुंग्यांचं क्षेत्र टाळू लागले.सरडे,सापसुरळ्या दूर गेल्या. त्या कोणालाच महासमाजाच्या क्षेत्रात पुरेस अन्न मिळेना.जे काही अन्न होतं,ते खायला गेलं की ज्यादाच आक्रमक मुंग्या चावायच्या.या लहान जीवांवर जगणारे सापही तिकडे जाईनात.कारण त्यांना भक्ष्य मिळेना.अखेर माणसांचं लक्षही महासमाजाकडे गेलं.नोकोबीत पिकनिकसाठी जाणारे,घुबड तलावात मासे पकडायला जाणारे,सगळ्यांनाच बदल-मुंग्यांचा त्रास व्हायला लागला.
वारुळांनी लदबदलेल्या त्या क्षेत्राला सगळे जण टाळायला लागले.पूर्वी पायवाट वारूळ,ओढा वारूळ, असी तुरळक वारुळं लक्षातही येत नसत.आता माती उकरण्याच्या खुणा टाळणंच अशक्य झालं.पूर्वी लहान मुलंच वारुळांकडे लक्ष द्यायची.आता सगळे आश्चर्यानं साम्राज्याकडे पाहायचे.अखेर या प्रकाराबद्दलचं माणसांचं मत मांडलं गेलं,"काहीतरी नव्याच प्रकारच्या मुंग्या आहेत,आग्या मुंग्यांपेक्षाही त्रासदायक.छ्याः यांचा बंदोबस्त करायलाच हवा!"
महासमाजानं आपला परिसर कह्यात घेतला होता;शत्रू आणि स्पर्धकांवर मात केली होती;आपलं भौगोलिक क्षेत्र आणि अन्नक्षेत्र वाढवलं होतं;नवे ऊर्जास्रोत शोधले होते;आणि या सगळ्याचा परिणाम म्हणून मुंग्यांची पैदास विक्रमी पातळीवर नेऊन ठेवली होती.पण घुबड तलावाच्या किनाऱ्यावरची महासमाजाची पकड टिकाऊ नव्हती.परिसरशास्त्राच्या दीर्घ कालगणनेच्या मापांत महासमाज फार तर मूठभर वर्षे टिकणार होता.क्षेत्र वाढवतानाच त्याच्या बदल्यात महासमाजानं शाश्वतीचा बळी दिला होता.जो जीन-बदल यशाकडे नेणारा वाटला होता,तो खरं तर घोडचुकीसारखा होता !
'वारुळ पुराण',माधव गाडगीळ',ई.ओ.विल्सन,अनुवाद - नंदा खरे,मनोविकास प्रकाशन
परिसराचा ऱ्हास करणं,ही महासम्राज्याच्या स्थापनेसाठी,
वाढीसाठी दिलेली जबर किंमत होती. भरपूर ऊर्जा खात,अन्न खात असतानाच प्रत्येक जीव परिसराचंही काही देणं लागत असतो.
काही काळासाठी ही कर्जफेड थांबवता येते.आपलं क्षेत्र वाढवण्यानं कर्जफेड जराशी पुढे ढकलता येते.पण क्षेत्र मर्यादित असतं.ते फार वाढवत नेता येत नाही.कधी नवा अन्नस्रोत शोधूनही ऊर्जेची परतफेड पुढे ढकलता येते.पण यानंतरही प्रश्न सुटत नाहीत,कारण मग भविष्यात जास्तच ऊर्जा फेडावी लागते.
तर महासमाज लवकरच पेचात येणार,हे उघड होतं. सगळ्या जीवजाती आपापल्या परिसरात तारेवरची कसरत करत असतात.परिसरातून जेवढी ऊर्जा,जेवढं अन्न घेतो;तेवढं अन्न आणि तेवढी ऊर्जा परत करणं,ही तोल सांभाळायची एकुलती एक पद्धत आहे.तोल जाऊन कपाळमोक्ष होण्याच्या मात्र हजारो पद्धती आहेत.
निसर्ग याच तन्हेनं चालतो.उत्क्रांती याच मर्यादांमध्ये वावरते.
मुंग्यांना तगवून ठेवणारी वागणूक त्यांच्या मूलप्रवृत्तीमधून घडली होती.ह्या मूलप्रवृत्ती जीन्समुळे घडल्या होत्या.ही सगळी जीन्स मूलप्रवृत्ती-वागणूक रचना पूर्वी यशस्वी ठरली होती.इतिहासातल्या वेगवेगळ्या घटनांमुळे त्या रचनेचे भाग उद्भवले आणि टिकून राहिले होते.पण हे सगळं होऊन गेलं होतं.पुढे काय होईल यासाठी तयारीत राहणं,हे अशक्य होतं. तसं करणं,हे जीन्समुळे घडलेल्या वागणूक-रचनेचं कामच नव्हतं.एखादी नवी स्थिती उद्भवणं,एखाद्या जीन-बदलानं तात्पुरतं यश देणं,यातून फक्त पुढचं संकट जवळ येत असतं.सतत बदलत्या परिस्थितीत टिकून राहायला नेमकी शाश्वत वागणूक लागते आणि नशीब लागतं.महासमाज तारेवरून कोसळणार होता.या एका बाबतीत तो आसपासच्या मानवी वारुळासारखा होता. आणि महासमाज कोसळण्यात माणसं - मुंग्यांना चालती-हलती झाडं वाटणारी माणसं यांचा हात होता.
■■■ समाप्त ■■■