* विजय गायकवाड | Vijay Gaikawad

live

नमस्कार आपले स्वागत आहे. मी पुस्तके आणि मित्रांवर पैसे खर्च करतो,माझ्याकडे दगड आणि विटांवर खर्च करण्यासाठी पैसे नाहीत.- रस्किन बाँड.ही थोर माणसं व त्यांचे विचार मला पुस्तकात भेटलीत.ती भेटली आणि त्यांनी सांगितले कि, प्रत्येक दिवशी असं काही तरी करा की,ते तुम्हाला अधिक सुंदर उद्याच्या दिशेने खूप लांबवर घेऊन जाईल."- डोग फायरबाऊ.' सर्वियन कादंबरीकार मिलोराद पावीच यांचे एक वाक्य आहे ते म्हणतात - जोवर जगात पुस्तक वाचणाऱ्या वाचकांची संख्या बंदूकधारी सैनिका पेक्षा अधिक आहे तोवर काळजीच काहीच कारण नाही.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात.पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये.म्हणून अविरतपणे प्रयत्न करणारे मार्गदर्शक, मित्र धावून येतात.प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,डॉ.दीपक शेटे,आ.भरत बुटाले,प्रा.सर्जेराव राऊत,सुभाष ढगे,अनिल फारणे,डॉ.सुधीर सरवदे ,विश्वास खाडे, विनायक पाटील,संजय कुंभार,सतीश खाडे,मनोहर सुर्वे,गणेश खंदारे,तात्या गाडेकर, दादासाहेब गाडेकर, दादासाहेब ताजणे, पुस्तकातील घटना प्रसंग सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील यांनी केलेले आहे. मला लिहिण्याची प्रेरणा देणारी पुस्तके,लेखक,प्रकाशक,मित्र ही जगावेगळी माणसं माझ्या जीवनातील महत्वाचा टप्पा आहेत.... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ.मेघा गायकवाड, चिरंजीव मयान,माझ्या धावण्यातील गुरुवर्य नामदेव बरुरे,लुल्ला शेख मोठी ताई ,लहान ताई जयश्री शिंदे या सर्वांचेच मनापासून आभार व धन्यवाद मॅट्रिक फेल विजय गायकवाड

7/19/26

प्राण्यांमधलं फलन / Fertilization in animals

लैंगिक प्रजननामध्ये दोन वेगवेगळ्या लिंगांच्या प्राण्यांची गॅमेट्स (सेक्स सेल्स) एकत्र येऊन त्यापासून नवा जीव जन्म घेतो.मादीकडून बीजांड आणि नराकडून शुक्रजंतू येतात.मासे,बेडूक आणि पाण्यातल्या अनेक जलचरांमध्ये फर्टिलायझेशन (फलन) हे पाण्यातच होतं. नर आणि मादी आपापली बीजं पाण्यात सोडतात आणि ती पाण्यातच फलित होतात.हे फलन मादीच्या शरीराच्या बाहेर होत असल्यानं या प्रकाराला एक्सटर्नल फर्टिलायझेशन म्हणतात.पण तेच फलन सस्तन आणि पाण्याबाहेर राहणाऱ्या प्राण्यांमध्ये मादीच्या शरीरात होतं म्हणून त्याला इंटर्नल फर्टिलायझेशन म्हणतात.यात बीजांड हे मादीच्या शरीरात स्थिर असतं आणि शुक्रजंतूंनाच बीजांडापर्यंत यावं लागतं.फर्टिलायझेशन (फलन) मादीच्या शरीरातलं असो किंवा मादीच्या शरीराच्या बाहेरचं असो, शुक्रजंतूंचा प्रवास हा द्रव माध्यमातून होतो.कधी हे माध्यम नदी किंवा समुद्रातलं पाणी असेल किंवा कधी ते मादीच्या शरीरातला जननमार्ग असेल.त्यातही शुक्रजंतूंना पोहायला द्रव माध्यम उपलब्ध असतं. शुक्रजंतूंचा आकार पाहता ते खरं तर फार लांब अंतरावरून प्रवास करून बीजांडापर्यंत येतात. प्राण्यांमध्ये बीजांड हे कायमच शुक्रजंतूपेक्षा मोठं असतं आणि जेव्हा बीजांड स्थिर असतं तेव्हा शुक्रजंतूच बीजांडापर्यंत येतात.

बेडकासारख्या अँफिबियन प्राण्यांमध्ये शुक्रजंतू आणि बीजांड हे दोन्हीही पाण्यात तरंगणारे,वाहणारे किंवा पोहणारे असू शकतात.

इंटर्नल फर्टिलायझेशन करणाऱ्या प्राण्यांमध्ये गॅमेट्स वाहून नेणारे लैंगिक अवयव असतात.पक्ष्यांमध्ये त्यांना क्लोएका म्हणतात. त्यामुळेच पक्ष्यांच्या समागमाला 'क्लोएकल किस' म्हणतात.तर प्राण्यांमध्ये नराचं लिंग आणि मादीची योनी असते.पक्ष्यांमध्ये समागम झाल्यानंतर पक्ष्याचं अंडं मादीच्या पोटातच फलित होतं. आणि त्यावर कॅल्शियमचं आवरण येऊन ते अंडं बाहेर पडतं.आणि मग त्यात पिलाची वाढ मात्र त्या अंड्यात मादीच्या शरीराच्या बाहेर होते.म्हणजेच पक्ष्यांमध्ये फर्टिलायझेशन तर मादीच्या शरीरात होतं,पण गर्भाची वाढ मात्र मादीच्या शरीराबाहेर होते.सस्तन प्राण्यांमध्ये मात्र फर्टिलायझेशन आणि गर्भाची वाढ हे दोन्हीही मादीच्या शरीरातच होतात. फर्टिलायझेशनचे असे वेगवेगळे प्रकार असले तरी शुक्रजंतूनं बीजांडपेशीचं फर्टिलायझेशन करणं ही प्रक्रिया मात्र सगळ्या प्राण्यांमध्ये (अ‍ॅनिमल किंग्डममध्येच) सारखीच असते हे मात्र सजीवांमधल्या अ‍ॅनिमल किंग्डमचं एक फार मोठं वैशिष्ट्य म्हणावं लागेल.असं सगळं असलं तरी माणसाला प्राण्यांमध्ये फर्टिलायझेशन कसं होतं हे मात्र कळत नव्हतं.कारण आपण अनेकदा प्राणी समागम करताना पाहू शकतो, गर्भामध्ये वेगवेगळ्या अवस्थेत असलेले प्राणी आणि मानवी अर्थक पाहू शकतो,

अंड्यातून पिलू बाहेर येताना पाहू शकतो आणि प्राण्याच्या पिलाचा जन्म होतानाही पाहू शकतो.पण समागम ते प्राण्याचा जन्म हा प्रवास मात्र अनेक शतकं कळण्याच्या पलीकडे होता. त्यातूनही बीजांड आणि शुक्राणू यांची भूमिका नेमकी काय असते याचं कोडं खूपच मोठं होतं.

१८७५ साली मात्र जर्मन वैज्ञानिक ऑस्कर हर्टविग यानं समुद्रातल्या सिअर्चिन या प्राण्याचे गॅमेट्स एकत्र येऊन होणारी फर्टिलायझेशनची प्रक्रिया पाहिली.या नंतर मात्र माणसाला फर्टिलायझेशन या प्रक्रियेबद्दलचं गूढ उकलत गेलं.बहुतांश प्राण्यांमध्ये शुक्राणू हे बीजांडाकडे पोहत जातात.पण शुक्राणूंसाठी हा प्रवास खूप अवघड आणि अनेक अडथळ्यांचा असतो.एका बीजांडाला फलित करायला लाखो किंवा काही वेळा कोट्यवधी शुक्रजंतू एका समागमातून मादीच्या योनीमध्ये सोडले जातात. पण माणसामध्ये प्रत्यक्ष बीजांडापर्यंत फक्त २००च शुक्रजंतू पोहोचतात तर उंदरामध्ये त्यांची संख्या ही केवळ २० इतकी कमी असते.

एक्सटर्नल फर्टिलायझेशनमध्ये अनेक बीजांड आणि शुक्रजंतू पाण्यात सोडली जातात.पण नदी आणि समुद्रात अशा प्रकारची अनेक बीजांड आणि शुक्रजंतू असणार.पण मग नेमक्या आपापल्या जातीच्या प्राण्यांचे शुक्राणू आपल्याच जातीच्या मादीची अंडी कशी फलित करतात? या प्रश्नानं माणूस कायमच आश्चर्यचकित झालाय. याचं उत्तर अमेरिकन एंब्रियॉलॉजिस्ट फ्रैंक लिली (Frank Lillie) यानं १९१२ साली दिलं. पाण्यात तरंगणाऱ्या फलित न झालेल्या बीजांडातून काही विशिष्ट प्रकारची रसायनं पाण्यात सोडली जातात आणि ती चक्क स्पर्मच्या पेशी आवरणातून आत बाहेर जाऊ शकतात.ही रसायनं स्पर्मला ओळखू येतात आणि त्यांचं कॉन्सन्ट्रेशन कुठे वाढत चाललं आहे हे त्या स्पर्मला कळतं आणि तो स्पर्म मग त्या दिशेनं जायला लागतो! हे फ्रैंकला एका फारच साध्या पण अभिनव प्रयोगातून लक्षात आलं.त्यानं एका पाण्यानं भरलेल्या बाऊलमध्ये सिअर्चिनचे काही स्पर्म घेतले.खरं तर त्या पाण्यात बीजांड नसल्यामुळे ते भरकटल्यासारखेच इकडेतिकडे उगाचच फिरत होते.पण थोड्या वेळानं फ्रैंकनं सिअर्चिनचं बीजांड ठेवलेल्या बाऊलमधल्या पाण्याचा एक थेंब फक्त स्पर्म असलेल्या बाऊलमध्ये टाकला.

काहीच वेळात त्या पाण्याच्या थेंबाभोवती चक्क काही स्पर्मनी फेर धरला होता। याचाच अर्थ फलित न झालेलं बीजांड पाण्यात नक्की काहीतरी ओळख पटणारी रसायनं सोडत असणार हे सिद्ध झालं होतं.

यानंतर हे रसायन नेमकं काय होतं हे १९८१ साली फार्माकोलॉजिस्ट जे रॅडॉल हान्सब्रोग (J Randall Hansbrough) आणि डेव्हिड गार्बर्स (David Garbers) यांनी शोधून काढलं. त्याला त्यांनी रिसॅक्ट असं नाव दिलं. २००३ मध्ये जर्मन बायॉफिजिसिस्ट अर्लिच बेंजामिन कौप (Urlich Benjamin Kaupp) यानं तर असं दाखवून दिलं,की स्पर्म केवळ एका रिसॅक्टच्या रेणूलासुद्धा ओळखून त्यानुसार आपल्या पोहण्याची दिशा ठरवू शकतो!

तर सस्तन प्राण्यांमधल्या इंटर्नल फर्टिलायझेशनमध्ये स्पर्म्जना ऱ्हिओटॅक्सिस नावाच्या हालचालीमुळे मार्गदर्शन मिळतं.

स्पर्म्जचा हा प्रवास उंदरांवर आणि माणसांवर प्रयोग करून कियोशी मिकी (Kiyoshi Miki) आणि डेव्हिड क्लॅफम (David Clapham) यांनी २०१३ मध्ये शोधून काढला.मादी उंदीर आणि स्त्रिया यांच्या प्रजनन मार्गाच्या योनी,गर्भाशय आणि फॅलोपियन ट्यूब त्वचेतून एक प्रकारचा द्रव योनीमार्गाद्वारे सवत असतो.त्यामुळे योनीमार्गात असलेला म्युकस आणि इतर टाकाऊ पदार्थ बाजूला सारले जाऊन स्मर्जना बीजांडापर्यंत पोहोचण्याचा मार्ग मोकळा होतो.पण गंमत म्हणजे नेमके स्पर्म्जही त्याच मार्गावरून पण उलट दिशेनं प्रवास करत असतात.मग यातूनच त्या स्पर्म्जना आपल्याला नेमकं कुठं जायचं आहे याची दिशा कळते आणि ज्या रस्त्यात जास्त राडारोडा असेल त्या रस्त्यातून आपल्याला जायचं आहे हे त्या स्पर्म्जना कळतं. गंमत म्हणजे याच पद्धतीमुळे स्पर्म्जच यातून मार्गक्रमण करू शकतात. त्यामुळे केवळ सक्षम स्पर्म्जच बीजांडापर्यंत पोहोचतात आणि बीजांडाला फलित करतात.

आणखी एका संशोधनानुसार बीजांडाच्या जवळपास कायम प्रोजेस्टेरॉन सवलं जातं.त्यामुळे ज्या दिशेकडून येणाऱ्या राडारोड्यात प्रोजेस्टेरॉन जास्त असेल त्या दिशेनं मग स्पर्म्ज आपला प्रवास करतात असं दिसून आलं आहे.

एकदा का काही स्पर्म्ज बीजांडापाशी पोहोचले की त्यांच्यापुढे पुन्हा बीजांडावरचे आणखी तीन अडथळे पार करण्याचं आव्हान असतं.

पहिला अडथळा करोना रेडिएटाचा असतो. दुसरा हा जेली लेयरचा असतो, तिसरा अडथळा हा व्हायटेलाइन एनव्हलपचा असतो. त्यानंतरच खऱ्या अर्थानं या गॅमेट्सचं मिलन होतं.

सस्तन प्राण्यांमध्ये ही जेली इलास्टिक आणि घट्ट द्रवाची असते.क्युम्युलस पेशींची ती बनलेली असते. या पेशी बीजांडाला पोषण करत असतात.स्पर्म आपली काही एन्झाइम्स आणि आपलं बळ (ब्रूट फोर्स) वापरून ही हा जेलीचा थर भेदून आत पोहोचतात.त्यानंतर पुढचा अडथळा बीजांडाच्या एनव्हलपचा (आवरणाचा) असतो.सस्तन प्राण्याच्या बीजांडाच्या एनव्हलपला आपण झोना पेल्युसिडा म्हणतो.जेव्हा स्पर्म या झोना पेल्युसिडापाशी पोहोचतो,तेव्हा तो तिचं ग्लायकोप्रोटीन (झेडपी १,झेडपी२इ.) ओळखतो. गंमत म्हणजे प्रत्येक प्राण्याच्या बीजांडावर असलेल्या झोना पेल्युसिडावर वेगळं ग्लायकोप्रोटीन असतं आणि ते त्याच जातीच्या नराच्या स्पर्मला ओळखू येतं. त्यामुळेच स्पर्म इथपर्यंत पोहोचूनही आपल्याच स्पिशीजच्या मादीकडून फलित होतो.हे पाहिलं की निसर्गाच्या किमयेला दाद द्यावी तितकी थोडीच असं वाटतं.आणि मग स्पर्मनं झोना पेल्युसिडा ओळखली की तो स्पर्म आपल्या डोक्यावरच्या अ‍ॅक्रोसोम नावाच्या टोपीत असलेलं एन्झाइम त्यावर सोडतो आणि त्यात चक्क ती झोना पेल्युसिडा विरघळते आणि त्यातून स्पर्म आत जातो. आता तो पेशीच्या शेवटच्या अडधळ्यापर्यंत म्हणजेच सेल मेंब्रेनपर्यंत पोहोचतो आणि शेवटी एकाच भाग्यवंत स्पर्मला बीजांडाच्या आतमध्ये प्रवेश मिळतो आणि त्या स्पर्ममधलं जेनेटिक मटेरियल शेवटी त्या बीजांडात सोडतो.आता झोना पेल्युसिडा चक्क आपल्यावरचे राहिलेले ग्लायकोप्रोटीन्स झडून टाकते आणि त्यामुळे त्यानंतर दुसऱ्या स्पर्मला आत येता येत नाही.या घटनेला ब्लॉकिंग पॉलिस्पर्मी म्हणतात.आता बीजांड तर फलित होण्याची वाटच पाहत असतं आणि त्यासाठी ते आपली सेल सायकल थांबवून बसलेलं असतं.सेल सायकल थांबते म्हणजे त्यात विशिष्ट ब्लॉक्स तयार होतात,हे आपण सेल सायकल या प्रकरणात पाहिलंच आहे.

बीजांडाला फलित करताना स्पर्म नेमकं तेच ब्लॉक सोडवणारं एन्झाइम बीजांडात सोडतो.शिवाय,

आपण इतक्या लांबून जपून आणलेले क्रोमोसोम्सही बीजांडाच्या हवाली करतो आणि स्पर्म म्हणून स्वतःचं अस्तित्व बीजांडाच्या स्वाधीन करून संपून जातो. इथेच झायगोट निर्माण होतो.

आता बीजांडामध्ये सगळ्या गुणसूत्राच्या पुन्हा जोड्या होतात आणि बीजांडाची थांबलेली सेल सायकल मायटॉसिसनं सुरू होते.याला गर्भधारणा झाली असं म्हटलं जातं.वेगानं विभाजित होणाऱ्या झायगोटला आता एंब्रियो म्हटलं जातं.

अच्युत गोडबोले,अमृता देशपांडे,मधुश्री पब्लिकेशन सजीव.

एका फलित पेशीपासून (झायगोटपासून) गर्भाशयात संपूर्ण वाढ झालेलं अर्भक तयार होणं ही घटना खरं तर प्रचंड वेगात होणारी,क्लिष्ट आणि त्याचबरोबर अत्यंत नाट्यमय असते.

माणसासाठी हा काळ साधारणपणे नऊ महिने आणि दहा दिवसांचा असतो.एखाद्या स्त्रीची पाळी चुकल्यानंतर पुढच्या नऊ महिन्यांनंतर ती अर्भकाला जन्म देते हे पूर्वी सगळ्यांनीच पाहिलं होतं. पण गर्भधारणा होते म्हणजे नेमकं काय होतं? मातेच्या पोटात गर्भ कसा वाढतो? मुलगा होणार की मुलगी होणार? जन्माला आलेलं अर्भक आई-वडिलांचे कोणकोणते गुण घेणार? यावर पूर्वी संशोधन झालेलं नसल्यामुळे याबद्दल तेव्हा अनेक मजेशीर कल्पना होत्या. आता मात्र विज्ञानाच्या प्रगतीमुळे गर्भाची वाढ होऊन मूल कसं जन्माला येतं याविषयी आपल्याला बरंचसं माहीत झालंय.

पूर्वी हिप्पोक्रॅट्स आणि इतर ग्रीक विचारवंत यांनी पॅब्जेनेसिस (सर्वोत्पत्तिवाद) ची कल्पना मांडली होती. पुरुषाच्या शरीरातल्या प्रत्येक अवयवातून काही कण हे त्याच्या वीर्यामध्ये जातात,तसंच स्त्रीच्या प्रत्येक अवयवातून वेगवेगळे कण तिच्या गर्भाशयातल्या बीजांडात जातात आणि पुनरुत्पादनाच्या वेळी प्रत्येक अवयवासाठी असलेले वडिलांचे आणि आईचे कण एकत्र येतात आणि त्यातूनच होणाऱ्या मुलाचे वेगवेगळे अवयव बनतात आणि त्यामुळेच साहजिकच मुलामध्ये आई आणि वडिलांचे असे दोघांचेही गुण येतात अशी ही थिअरी होती.गंमत म्हणजे उत्क्रांतिवादाची प्रसिद्ध थिअरी मांडणाऱ्या डार्विननंही ही थिअरी उचलून धरल्यामुळे तिच्याविरुद्ध बोलणं हे एकोणिसाव्या शतकापर्यंत अवघडच होतं !

पण ऑगस्ट वाईजमन (१८३४-१९१४) या जर्मन जैववैज्ञानिकानं उंदरांवर प्रयोग करून ही थिअरी खोडून काढली.त्यानं काही उंदरांच्या शेपट्या कापल्या.त्यामुळे पॅन्जेनेसिसप्रमाणे त्यांच्या पुढच्या पिढीत ते शेपटीचे 'कण' जाऊ शकणार नव्हते. पण तरीही त्या उंदरांना पिलं झाल्यानंतर,तर त्यांना मात्र लांबच शेपट्या होत्या! त्यानं पुढच्या अनेक पिढ्यांतल्या उंदरांच्या शेपट्या कापल्या तरी शेवटी पुढच्या पिढीतल्या उंदरांना नॉर्मल शेपटी येतच राहिली.

खरं तर शेपटी कापल्यानंतर पुनरुत्पादनाच्या वेळी शेपटीतले ते कण नवीन पिढीत जायला नको होते.पण तसं होत नव्हतं.याचा अर्थ 'कुणीही एका पिढीत कमावलेले किंवा गमावलेले गुण हे नवीन पिढीत जात नाहीत' असं सांगून त्यानं 'जर्म थिअरी' मांडली.त्यातून त्यानं सोमॅटिक सेल्स (शरीराच्या इतर पेशी) या आनुवंशिकतेचे गुण वाहत नाहीत तर 'जर्म सेल्स'च (म्हणजे बीजांड आणि शुक्रजंतू (गॅमेट्स)) आनुवंशिकतेचे गुण वाहतात असं त्यानं दाखवून दिलं आणि 'पॅन्जेनेसिस'ची कल्पना खोडून काढली.

याबद्दलची आणखी एक संकल्पना म्हणजे पृथ्वीवर अस्तित्वात असलेला प्रत्येक जीव हा आधीच कोणत्यातरी 'जर्म सेल'मध्ये अगदी सूक्ष्म पण पूर्ण स्वरूपात अस्तित्वात असतो.या सूक्ष्मजीवाला 'होमोक्युल्स' म्हणत.मातेच्या गर्भात आल्यावर या होमोक्युल्सचा फक्त आकार तेवढा वाढतो. आणि जन्माच्या वेळी त्या सजीवाचं पूर्ण वाढ झालेलं अर्भक मातेच्या गर्भातून बाहेर येतं,असं ही थिअरी सांगत होती.

अपुर्ण राहिलेला भाग पुढील भागामध्ये…

7/17/26

पऱ्यांचा परिसर / Precincts of fairies.

एकदा महर्षी टॉलस्टॉयनं मॅक्सिम गॉर्कीला विचारलं, "तुला हॅन्स अँडरसनच्या परीकथा आवडतात काय ?" नंतर विचारमग्न होऊन तो म्हणाला,

"परीकथांचे रशियन भाषांतर मी वाचलं होतं.नंतर दहा वर्षांनी ते पुन्हा वाचून काढलं.अन् मला जाणीव झाली की हॅन्स अँडरसन जीवनात किती एकटा होता.अगदी एकटा.तो भटक्या होता आणि म्हणूनच एकटा होता."

हॅन्स अँडरसनच्या बापानं त्याला समजावून घेतलं.पण त्याच्या मरणानंतर तो आई असूनही पोरका झाला. इथूनच त्याच्या परिकथेतल्या जीवनाला सुरुवात होते. निराधार हॅन्स एकटाच नशीब शोधायला ह्या उघड्या जगात निघाला.तो म्हणायचा,'दुष्ट पऱ्यांनी मला निराधार,निराश्रय केलं.'पण त्यांनीच त्याला राजवाड्यात नेलं.डेन्मार्कचा राजा फ्रेडरिक याच्या आश्रयाला तो राहिला.तिथं त्यानं मन लावून अध्ययन केलं.साऱ्या युरोपभर त्यानं प्रवास केला.वन,प्राणी आणि पक्षी यांच्या जगात तो रमला.

स्वतःभोवती त्यानं एक आगळंवेगळं पऱ्यांचं जग निर्माण केलं.तो जगद्विख्यात परिकथाकार झाला.जगातला तो पहिला परीकथाकार. अन् आयुष्याच्या शेवटी म्हणाला,'चांगल्या पऱ्यांनी माझं जीवन आनंददायी केलं.माझ्या हातून परीकथा लिहून घेतल्या.'

मला नेहमी वाटे,खरंच पऱ्यांचं खरंखुरं जग असावं काय ? माझं सारं आयुष्य जंगलात गेलेलं.पण मी चुकूनही कधी हाती बंदूक धरली नाही.शिकाऱ्याच्या बंदुकीला जंगली जनावरं तर बळी पडतातच;पण आपल्याला न दिसणारी छोटीछोटी माणसंही हकनाक बळी पडत असावीत.मला आठवतं ते परीचं गाणं-

'Up the airy mountain

Down the rushy glen,

We daren't go a-hunting,

For fear of little men.'

नवेगाव-बांधावरील माझ्या निवासस्थानी माझी मुलगी छाया कित्येकदा घरासमोरच्या आवळीच्या झाडाखाली तासन्तास एकटीच खेळत असे.कित्येकदा स्वतःशीच तिची गुणगुण वा बोलणं चाले.दुर्दैवानं तिच्या वयाचे सोबती-सवंगडी तिला जंगलात कधी बरोबर खेळायला मिळालेच नाहीत.मी तिला एकदा सहज विचारलं, "अगं,तू कुणाशी बोलत असतेस ? तुला वेड तर लागलं नाही ?"ती हसतबागडत म्हणाली, "कुणाशी म्हणजे ? पऱ्यांशी बोलते.

आपल्या घरामागच्या उंच पहाडातल्या जंगलातून त्या रोज माझ्याबरोबर खेळायला येतात.कधी झाडावरची बोरं,तर कधी एरुण्या,तर कधी करवंदं तोडायला त्या मला मदत करतात.त्यांना आपल्या मोराच्या पिलांशी खेळायला फार आवडतं."

"असं काय ! कशा दिसतात त्या?"

"हॅन्स अँडरसनच्या परीकथेतल्या पऱ्यांसारख्या."

त्यावेळी छाया चौथीत होती.तिच्या वाढदिवशी मी हॅन्स अँडरसनच्या परीकथेचा संच तिला भेट दिला होता.ती मन लावून अभ्यास करी.पण जंगलात तिच्या शिक्षणाची आबाळ झाली.

पाठीला पुस्तकांचं न पेलवणारं ओझं टांगून भुरुभुरु हवेत केस उडत असलेली चिमुरडी छाया जंगलातल्या वाटेनं शाळेतून दोनतीन किलोमीटरचं अंतर चालत येत असल्याचं दृश्य मी अजूनही विसरलो नाही.लहान मुलं खोटं बोलत नाहीत.असं असलं तरी मला हे सारे तिच्या मनाचे खेळ असावेत असं वाटलं.ती गोष्ट नंतर मी पार विसरून गेलो.छायाचं एकटीनं खेळणं चालूच होतं.

नंतर काही वर्षांनी यॉर्कशायर इथल्या दोघी बहिणींची एक सत्यकथा वाचली.१९२० साली 'स्ट्रेंड' ह्या ख्यातनाम इंग्रजी मासिकात पहिल्यांदा पऱ्यांचे फोटो प्रसिद्ध करण्यात आले.१९१७ च्या वसंत ऋतूत एल्सी आणि फ्रान्सिस ग्रिफिथ या अनुक्रमे सोळा व दहा वर्षांच्या मुलींनी पऱ्यांबरोबर मैत्री जोडली. त्या त्यांच्याबरोबर कॉटिंगलेतल्या घरामागच्या अरुंद दरीत

खेळत.नवीन सवंगड्यांविषयी त्या दोघींनी आपल्या आई-वडिलांना सांगितलं.पण त्यांनी त्या मुलींवर विश्वास ठेवला नाही.एल्सीनं वडिलांचा कॅमेरा घेतला, अन् चक्क आपल्याबरोबर खेळणाऱ्या बागडणाऱ्या पऱ्यांचे फोटो खेचले.ते 'स्ट्रेंड'मध्ये प्रसिद्ध करण्यात आले.लोकांचा त्यावर विश्वास बसेना.अनेक निष्णात छायाचित्रकारांनी ती छायाचित्रं आणि निगेटिव्हज तपासले.त्यात कुठलाही तांत्रिक दोष नव्हता.परंतु पऱ्या या जगात अस्तित्वात नसताना ही छायाचित्रं मिळाली कशी,याचं कोडं काही उलगडेना.

यात काहीतरी लबाडी आहे असं अनेक जिज्ञासूंना वाटू लागलं.

शेवटी प्रख्यात गुप्त पोलीस अधिकारी सर आर्थर कॉनन डॉयल याची या प्रकरणी चौकशी करण्याकरिता नेमणूक करण्यात आली.त्यानं दुसरा कॅमेरा घेतला.फोटोग्राफी-प्लेटवर ओळखणीसाठी खुणा केल्या,आणि त्या कॅमेऱ्यानं पऱ्यांचे फोटो काढण्यासाठी एल्सीला सूचना दिल्या. एल्सीनं पुन्हा पऱ्यांचे फोटो घेतले आणि डॉयलला दाखवले.त्यानं पाहिलं-पायांत लहान बूट,डोक्यावर निमुळती टोपी व पंख असलेल्या पारंपरिक पऱ्या त्यात दिसत होत्या.डॉयलला आश्चर्याचा धक्का बसला.या अभूतपूर्व घटनेवर त्यानं 'कमिंग ऑफ फेअरीज' हा ग्रंथ लिहिला.त्यात तो शेवटी म्हणतो,"या धरित्रीवर आपल्यासारखंच पऱ्यांचं एक जग अस्तित्वात आहे हे सिद्ध करता आलं तर आपल्या मनाची काय अवस्था होईल हे सांगणं कठीण.हे स्वायत्त जग अद्भुत असं आयुष्य जगतं;आणि आश्चर्य हे की वातावरणाच्या लहरीतील काही फरकानं ते आपल्यापासून वेगळं झालेलं आहे."

तुम्ही कधी नवेगाव-बांधला पहिल्यांदा गेलात की तळ्याकाठी मासे पकडणारा एखादा धीवर तुम्हाला एक गोष्ट ऐकवील.ती ऐकण्याची इच्छा असो वा नसो.

"बरं का सायब,”डोंगरावरच्या उंच शिखराकडे पाहात तो सांगेल,"हे मोठं तळं कोलदेवानं बांधलं.त्याला सात बहिणी होत्या."अन् लहान बांधाकडे बोट दाखवून म्हणेल,"ती पार पाहिलीत ? सात बहिणींनी ती बांधलीय.म्हणून तिला सात बहिणींची पार म्हणतात. त्या चिरंजीव आहेत.ह्या तळ्याचं अन् इथल्या जंगलाचं त्या संरक्षण करीत रात्रंदिवस फिरत असतात."

सात बहिणींच्या पारीवर उभं राहिलं की पाठीमागं सुंदर अद्भुतरम्य झिलाण आहे अन् पुढं खोलखोल अफाट पसरलेलं पाणी.तो धीवर पुढं म्हणेल,

"साब,इथं सोन्याची नथ ल्यालेली जलपरी आहे.ज्या धीवराच्या जाळ्यात ही परी सापडेल,त्याचं भाग्य उदयाला येईल."

ऐकणारा प्रवासी हे सारं जिज्ञासेनं,कुतूहलानं ऐकत असला,तरी त्याला ते खरं वाटत नाही.तरी पण ह्या तळ्याकाठी राहणारे धीवर हे सारं खरं समजून शतकानुशतकं लोकांना कथा सांगत असतात.

मला मात्र ते खरं वाटतं.इथल्या झिलाणीकाठच्या उंच दरडीवरच्या शिळांवर दिवसा,रात्री अन् पहाटे तासन्तास एकटा बसून मी पक्षिनिरीक्षण केलंय.इथंच मला परमेश्वररूपी सुंदर पक्ष्यांचं गूढ कळलं आहे.हा परिसर देवराई म्हणून अजूनही अस्पर्श आहे.निर्वंश होण्याच्या भीतीनं माणसाच्या कुऱ्हाडी इथपर्यंत अजून तरी पोहोचलेल्या नाहीत.

दरेकसाजवळच्या दलदलीकाठचा दल्लू गोंड तर अहोरात्र परीसाच्या चिंतनात असायचा.तिथल्या गूढ दलदलीभोवती फिरणाऱ्या परीसाच्या मागोमाग जायचा.त्याला तिथं अप्सरा दिसायच्या.सदान्कदा देवलोकात मग्न असलेला दल्लू एखाद्या जांभळीच्या सावलीत निभ्रांतपणे बसलेला दिसायचा.मी भेटलो की सौम्य स्मित करायचा.

गॅव्हिन मॅक्सवेलचा 'रिंग ऑफ ब्राइट वॉटर' हा हुदाळ्याविषयीचा ग्रंथ जगप्रसिद्ध आहे. हुदाळ्याच्या निरीक्षणाच्या व अभ्यासाच्या निमित्तानं तो समुद्रकाठच्या अतिदूर गावातल्या मोठमोठ्या,भव्य व उजाड निवासस्थानात एकटाच वर्षानुवर्षं राहिलाय. समुद्रकिनारी राहणाऱ्या कोळ्यांकडून त्यानं पऱ्यांविषयी ऐकलंय.बरंच काही त्यानं पाहिलं आहे आणि अनुभवलं आहे. 'रॅव्हन सीक द ब्रदर' ह्या ग्रंथात तो लिहितो,

"सायंकाळी लावलेलं जाळं काढण्यासाठी एकदा एक कोळी पहाटेच्या काळोखात समुद्रावर गेला.तिथं अंधार कधीच नसतो.

स्वयंभू प्रकाशानं सारा परिसर उजळला होता.त्यानं जाळं काढायला सुरुवात केली,तेव्हा नेहमीपेक्षा ते जड वाटलं.एखादी मोठी मासोळी सापडली असावी ह्या आनंदातच त्यानं आपलं जाळं ओढतओढत काठावर आणलं.पाण्याबाहेर काढलं. पाचसहा फूट लांबीची ही मासोळी नेहमीपेक्षा वेगळीच दिसत होती.त्या कोळ्यानं अगदी जवळून पाहिलं. कमरेपासून वर ती तरुण स्त्री होती;तर तिला खाली माशाचं शेपूट होतं.मातीशी नातं असलेला कोळी कधी भित्रा नसतो.त्यानं त्या स्त्रीला उचलून घरी आणलं.

घरी येताच तिची शेपटी गळून पडली आणि समोर एक सुंदर युवती उभी राहिली.तिची गळालेली शेपटी त्यानं अडगळीच्या खोलीत सांभाळून ठेवली.तिनं त्यानंतर त्याच्याबरोबर अनेक वर्षं सुखानं संसार केला.तिला मुलं झाली.पण एकदा त्या मुलांपैकी एकजण खेळत-खेळत अडगळीच्या खोलीत गेला असता त्याचा पाय चुकून त्या शेपटीवर पडला.आईकडे जाऊन त्यानं तिला विचारलं, 'आई,ती घरातली माशाची शेपटी ग कसली ?'

'अरेच्या ! ती तर माझी शेपटी !' जलपरी आनंदित होऊन मोठ्यानं म्हणाली,'माझी फार फार दिवसांपूर्वी हरवलेली शेपटी ! कशी मी विसरले कोण जाणे!'

आणि ती एकदासुद्धा मागं वळून न पाहता थेट समुद्राकडे निघाली.

त्यानंतर ती पुन्हा कधीही दिसली नाही!" हे झालं फार फार पूर्वीचं.त्या वेळी अस्पर्श्य वनं होती.गावानजीकच्या देवराई देवळाइतक्याच पवित्र होत्या.तळ्यामध्ये कमळं फुलत.तिथं पक्षिकुळं आश्रयाला येत.शहराजवळ सुंदर उद्यानं होती.नद्या संथ वाहत.त्यांच्या काठची झाडं आपलं पाण्यात पडलेलं स्वच्छ प्रतिबिंब पाहून हवेत आनंदानं डोलत.समुद्राच्या गाजेचा नादलुब्ध आवाज सुरू वृक्षाच्या पानापानांतून पाझरत कानी यायचा.खाडीला अद्भुतरम्य, गूढ खाजनीच्या जंगलांची हिरवीगार निःस्तब्ध किनार होती. वृक्षांना माणसं मानणारे आदिवासी जंगलात होते.

अन् गेल्या तीन-चार दशकांत हे सारं नष्ट होत चाललंय. जंगलं कमी होताहेत.देवराईचा कोळसा होतोय.खाडी सुकल्यामुळं तिच्या काठची जंगलं नाहीशी होताहेत. कारखान्यातलं दूषित पाणी नदीतून समुद्राला मिळत आहे.तळ्यातील पाण्याचा उपसा होतोय.सरोवरं आटत चाललीत.आभाळ आणि पाताळ कुणाच्या मालकीचं आहे ? ते देखील रेडिओ-अ‍ॅक्टिव्हसारख्या प्राणघातक किरणांनी दूषित झालेलं आहे.हे सारं उद्ध्वस्त होत असताना कितीजण व्यथित होत असतील ? पण ही सारी व्यथा एका स्त्रीनं 'सायलंट स्प्रिंग' या ग्रंथात मोठ्या प्रभावीपणं व्यक्त केली आहे.तिचं नाव रॅचेल कर्सन. ह्या ग्रंथानं साऱ्या जगाला परिसराविषयी विचार करायला लावलं.अन् अखेर परिसर-संरक्षणशास्त्राचा जन्म झाला.

जंगलाचं देणं,मारुती चितमपल्ली,साहित्य प्रसार केंद्र,सिताबर्डी,नागपूर.

पण हे सारं गेलेलं वैभव परत मिळणार काय ? लाभेलही कदाचित.पण त्याला भगीरथ प्रयत्न हवेत. भस्मासुराची गोष्ट आपल्याला माहीत आहे.त्याचं वरदानच शेवटी त्याला शाप ठरलं आणि तो नष्ट झाला.'परिसर' या शब्दाची व्युत्पत्ती व्याकरणकार काहीही करोत,पण मला वाटतं,पऱ्यांचा सर तो परिसर.ह्या पऱ्यांना वाचवा,म्हणजे सारा परिसर आपोआपच वाचेल !.

समाप्त




7/16/26

एका महामानवाचे एक भव्य स्वप्न ! A grand dream of a great man!

एका महामानवाचे एक भव्य स्वप्न ! A grand dream of a great man!

झंडा उंचा रहे हमारा" हे गीत गात मिरवणुका काढू लागली,हसतमुखाने तुरुंगात गेली.अल्प शिक्षण घेतलेली आणि हातावर पोट अवलंबून असलेली

बाबू गेनूसारखी माणसे मातृभूमीच्या भक्तीने धुंद होऊन जीवाची कुरवंडी करायला सिद्ध झाली. विश्वविद्यालयाच्या उच्च परीक्षांत चमकलेली माणसे खादीविक्री आणि हरिजन सेवा यांच्यासाठी खेडोपाडी पायी फिरण्यात आनंद मानू लागली, "म्हणती स्त्रिया रणी जाऊ ! त्यजिती मुले दिला खाऊ" अशा प्रकारचे तप्त धुंद वातावरण सर्व देशात निर्माण झाले.

साहजिकच मातीचा थंड गोळा वाटणारा सामान्य मनुष्य धगधगू लागला,समाजाच्या पायातल्या विविध अवजड, गंजलेल्या शृंखला आपल्याला तोड़न टाकायच्या आहेत या नव्या भव्य स्वप्नाने तो भारला गेला.१९२० ची असहकारितेची चळवळ,१९३० ची मीठ सत्याग्रहाची चळवळ आणि १९४२ ची 'चलेजाव' ची चळवळ यांच्याशी ज्यांचा थोडा फार संबंध आला असेल,निदान जे या चळवळीचे सहृदय साक्षी असतील त्यांना आजकाल एक गोष्ट तीव्रतेने जाणवल्यावाचून रहात नाही,ती म्हणजे त्या काळात सामान्य मनुष्यात निर्माण झालेले चैतन्य,एका विशाल ध्येयाचा त्याच्या जीवनाला झालेला परीसस्पर्श! ते चैतन्य आज अस्तित्वात आहे काय? या प्रश्नाचे प्रामाणिकपणाने उत्तर द्यायचे असेल तर गांधीजींनी ज्या मातीतून माणसे निर्माण केली,त्या मातीत ती पुन्हा मिसळून गेली आहेत हे मान्य केल्याशिवाय गती नाही! प्रभू रामचंद्रांनी आपल्या पदस्पर्शान शिलारूप झालेल्या अहिल्येचा उद्धार केला अशी कथा आपण वाचतो प्रभू रामचंद्र त्या वनातून निघून गेल्यावर अहिल्येची पुन्हा शिळा झाल्याचा विपरीत चमत्कार कोणत्याही रामायणात नमूद केलेला नाही! या देशात गेल्या वीस वर्षांत जे महाभारत घडले त्यात मात्र या विचित्र चमत्काराचे चित्र कुठे स्पष्ट दिसल्यावाचून रहात नाही.

नवा माणूस निर्माण व्हायला हवा.

गांधीजी नव्या माणसाची जी मूर्ती घडवायला निघाले होते,तिचे स्वरूप एकांगी नव्हते.या नव्या माणसाची स्वातंत्र्याची किंवा सुखाची कल्पना स्वतःपुरतीच मर्यादित असणे गांधींना मंजूर नव्हते. "ते स्वातंत्र्य खरे न फक्त अपुली जे तोडिते बंधने। अन्यांच्या पदशृंखलांस बघते निष्कंप ऐशा मने।" या ओळीत 'बी' कवींनी व्यक्त केलेली भावना त्यांना पूर्णपणे अभिप्रेत होती.माणसाचे राजकीय, सामाजिक, आर्थिक, वैचारिक, भावनिक असे तुकडे पाडणे म्हणजे त्याच्या आत्म्याचे तुकडे करण्यासारखे आहे,याची अत्यंत तीव्र जाणीव त्यांच्या ठायी सदैव जागृत होती.ही विविध अंगे असलेला मनुष्य मूलतःएकजीव आहे आणि म्हणून त्याच्या सर्व आविष्कारांत सुसंगती अवश्यमेव हवी,असा त्यांचा अट्टाहास होता.पारतंत्र्याच्या शृंखलांइतक्याच अस्पृश्यतेच्या बेड्या माणुसकीला मारक ठरतात.नवकोट नारायण आणि अठरा विश्वे दरिद्री यांच्यातल्या भेदाइतकाच जातिभेद किंवा वंशभेद अमानुष आहे; म्हणून आता जो नवा माणूस निर्माण व्हायला हवा,त्याने सर्व प्रकारच्या विषमतेविरुद्ध बद्धपरिकर (सिद्ध) झाले पाहिजे,असे गांधीजींचे स्वप्न होते.गांधींनी देशाला अनेक चांगल्या प्रेरणा आणि प्रवृत्ती दिल्या.पण त्यांतली सर्वात मोठी देणगी म्हणजे सामाजिक धर्मबुद्धीची जाणीव ही होय. जगप्रसिद्ध इतिहासकार टॉइन्बी याने असे म्हटले आहे की कोणत्याही राजकीय तत्त्वज्ञानाने मनुष्याचे जीवन सुखी होणार नाही,त्याच्या ठिकाणी जी सुप्त धर्मबुद्धी असते आणि जिच्यामुळे तो भोवतालच्या जगाचा स्नेहशील घटक बनतो.तिचा विकास हाच यापुढे स्वार्थ, संघर्ष,असंतोष आणि महायुद्धे यांच्या काळ्याकुट्ट छायेत वावरणाऱ्या माणसाला खराखुरा दिलासा देऊ शकेल.

स्वातंत्र्योतर काळात या सामाजिक धर्मबुद्धीचे परिपालन आपल्याकडून झाले काय,हा खरा प्रश्न आहे. ही धर्मबुद्धी जागती ठेवणे हे जसे गांधीजींच्या कर्तृत्वाची फळे चाखणाऱ्या त्यांच्या छोट्या-मोठ्या अनुयायांचे काम होते,तसेच गांधीजींच्यामुळे ज्याला जीवनातल्या चैतन्याचा आणि मांगल्याचा साक्षात्कार घडला त्या सामान्य मनुष्याचेही कर्तव्य होते.पण काही अपवाद वगळता सामाजिक धर्मबुद्धीच्या बाबतीत या दोन्ही वर्गांनी गांधींना दगा दिला,असेच प्रचलित वैफल्यावरून वाटते.

याचा अर्थ या देशात गेल्या वीस वर्षात प्रगतिपर असे काही घडले नाही असे नाही.सामाजिक विकासाच्या पाश्चात्त्य मोजमापांनी पाहिले तर आपण बरीच धडपड केली आहे.आकडेशास्त्राच्या आधारेच बोलायचे असेल तर गेल्या वीस वर्षाची वकिली करणे सोपे आहे. साक्षरता इतकी वाढली,दरडोई उत्पन्न अमुकपट झाले आहे.कुटुंब नियोजनावर इतके कोटी रुपये खर्च होत आहेत,इत्यादी तपशील खुलासेवार खुलवून सांगायला चतुर वक्त्याची जरूर आहे असे नाही.

ही समृद्धीची गंगा तळाच्या तहानलेल्या भूमीपर्यंत पोहचली आहे काय ?

हा तपशील कुणीही अमान्य करणार नाही. शतकानुशतके विज्ञानाकडे पाठ फिरवून बसल्यामुळे आपण साध्यासुध्या गरजांच्या बाबतीतसुद्धा करंटे बनून गेलो होतो.स्वातंत्र्य मिळाल्यावर आपण विज्ञानसन्मुख झालो.त्याच्या सहाय्याने भौतिक समृद्धी निर्माण करण्याच्या मार्गाला लागलो.या प्रयत्नांत द्रष्टेपणाच्या अभावी काही दोष निर्माण झाले असतील,इथली माती,इथला माणूस, इथल्या शक्ती आणि इथल्या मर्यादा यांचा विचार जसा व्हावा तसा झाला नसेल,औद्योगिक शक्ती ही एक प्रचंड राक्षसी शक्ती आहे.अल्लाउद्दिनाच्या दिव्याप्रमाणे ती क्षणार्धात राजवाडा निर्माण करू शकते,पण या राक्षसी शक्तीच्या जबड्यात सापडलेला मनुष्य एका अजस्त्र यंत्रातला अनामिक खिळा बनून जातो, भावनिक जीवनाला पारखा होतो,शरीरसुखे हात जोडून पुढे उभी असूनही त्याचे मन एका भयानक पोकळीत फडफडत राहते. 

इत्यादी गोष्टींकडे आवश्यक तेवदे लक्ष दिले गेले नसेल. हे सारे एक वेळ स्वाभाविक मानता येईल.कारण यांतले अनेक प्रश्न आजच्या भारताचे नसून उद्याच्या भारताचे आहेत,मूलतः ते साऱ्या जगाचेच आहेत! पण ही भौतिक समृद्धीची धडपड सुरू असताना गांधीजींनी जागृत केलेली सर्वसामान्य मनुष्याची सामाजिक धर्मबुद्धी उजळ आणि निर्मळ राहिली आहे काय? का त्या ज्योतीने काजळी धरली आहे? दैनिके वाचताना, सभासंमेलनाचे कार्यक्रम पाहताना भाणि सर्व क्षेत्रांतल्या पुढाऱ्यांची भाषणे ऐकताना सर्वत्र आबादीआबाद आहे असा भास होतो! गांधीजींना अभिप्रेत असलेल्या सामाजिक धर्मबुद्धीचा अंकुर उगवला तोच करपून गेला याची खंत कुणाला वाटत असलेली आढळत नाही.पण सार्वजनिक भाषणे,दर्शन,प्रदर्शने ही रंगमंचावरील नाटके असतात हे लक्षात घेऊन दैनंदिन सामाजिक जीवनाचे, संभाषणाचे मनोगतांचे आणि स्थित्यंतरांचे आपण निरीक्षण करू लागलो तर काय अनुभव येतो? साक्षरता झपाट्याने वाढत आहे. शिक्षणप्रसाराला भरती आली आहे.पण शहरी व ग्रामीण समाज सुसंस्कृत होत असल्याची चिन्हे मात्र कुठेच दिसत नाहीत! पदवीधरांच्या कारखान्यातून भरपूर माल बाहेर पडत आहे,पण ज्ञान विज्ञानाच्या आणि कला शास्त्रांच्या उपासनेत गढून गेलेले तरुण दुर्मीळ आहेत.बौद्धिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातली शिखरे गाठण्याकरता जीवाची कुरबानी करणारे शोधूनही मिळणे मुष्किल आहे.दरडोई वार्षिक उत्पन्न वाढले हे खरे! पण वाढती महागाई लक्षात घेता सामान्य मनुष्याचे जीवनमान उंचविण्याची शक्ती या आकड्यांच्या मायाबाजारात आहे काय? देशात निर्माण झालेली समृद्धीची गंगा सामाजिक तळाच्या तहानलेल्या भूमीपर्यंत जाऊन पोहचली आहे काय? या किंवा अशा प्रकारच्या अनेक प्रश्नांची उत्तरे उघड आहेत.डॉ. राममनोहर लोहियांसारख्या दलितांच्या झुंजार कैवाऱ्यांनी ती पूर्वीच परखडपणे व्यक्त केली आहेत !

गांधीजींना समाजाचे तसेच व्यक्तीचेही परिवर्तन हवे होते.

दुसऱ्या एका बाजूने गांधीजींना अभिप्रेत असलेल्या सामाजिक धर्मबुद्धीचा विचार करता येईल. स्वातंत्र्यपूर्वकाळातले शिक्षक,डॉक्टर,वकील,व्यापारी, पत्रकार,साहित्यिक,कलावंत इत्यादिकांच्या जीवनक्रमात देशभक्तीच्या भावनेचे जे सहजस्फुरण दृग्गोच्चर होत असे ते आजकाल दुर्मीळ का व्हावे? आजच्या गरिबांच्या जगात अमृताहूनही दुष्प्राप्य झालेले तूप आपल्या पोळीवर ओतून घेण्याची अहमहमिका जुने श्रीमंत आणि नवे धनिक यांच्यामधे किळसवाण्या रीतीने का प्रगट होत आहे? काटेकोर कायदे होऊनही ठिकठिकाणी हरिजनांचा अमानुष छळ होत असल्याच्या वार्ता कानावर का पडतात.? स्वातंत्र्योत्तर काळात श्रीमंत अधिक श्रीमंत झाले आणि बहुसंख्य गरीब अधिक गरीब झाले हे सिद्ध करायला अर्थशास्त्रज्ञ कशाला हवेत? लोकशाही समाजवादाचे ढोल आणि

गांधीजींच्या राष्ट्रपितृत्वाचे नगारे कानीकपाळी बडविले जात असताना आर्थिक विषमतेची दरी अधिक रुंद आणि अधिक खोल का होत आहे?

भरतीच्या वेळी समुद्राचा किनारा अवखळपणाने पुढे धावणाऱ्या आणि फेसाळत फुटणाऱ्या लाटांनी भरून जातो.जिकडे तिकडे पाणीच पाणी दिसू लागते.पण ओहोटी सुरू झाली की हे सुंदर,उत्साहवर्धक दृश्य पार पालटून जाते ! समुद्राचे पाणी मागे हटू लागते. किनाऱ्याचा रुंद पट्टा उघडा पडल्यामुळे भकास भासू लागतो.भरतीच्या पाण्याने लपविलेल्या किनाऱ्यालगत लहान मोठे खडक उघडे पडून या दृश्याच्या उदासपणात भर घालतात.किनाऱ्यावर पाचोळा आणि इतर घाण इतस्ततः पडलेली दिसते.नकळत हे सर्व प्रेक्षकाला निरुत्साही बनविते.

आजची भारतीय मनुष्याची परिस्थिती आणि मनःस्थिती यांचे जे चित्र दिसते,ते या ओहोटीच्या दृश्यासारखेच आहे काय ?

जीवनाची सामाजिक आणि आर्थिक बांधणी परंपरागत मार्गापेक्षा अत्यंत भिन्न पद्धतीने सुरू झाली आहे.या नावीन्यात आजच्या विफलतेचा उगम असेल काय? इमारत बांधली जात असताना डोळ्यात भरत नाही.ती वेडीवाकडी,ओबडधोबड भासते.रंगरंगोटी करून पूर्ण स्वरूपात ती समोर उभी राहिली म्हणजे सुंदर वाटते. आज सर्वसामान्य माणसाचे मन निरुत्साही आणि जीवन प्रवाहपतित झाले आहे.याचे मूळ संक्रमणाच्या वेगातून असू शकेल काय?

गांधीजींच्या स्वप्नांतला हा नवा भारतीय माणूस का गुप्त झाला?

गांधीजींना जसे समाजाचे तसेच व्यक्तीचेही परिवर्तन हवे होते.देशाच्या राजकीय घडीप्रमाणे त्याची आर्थिक शैक्षणिक,सामाजिक आणि सांस्कृतिक घडीही निराळ्या पद्धतीने बसविण्याचे स्वप्न त्यांनी सतत उराशी बाळगले होते.त्या दिशेने त्यांनी विविध उपक्रम सुरू केले होते. पण सर्व प्रकारच्या विषमतेपासून अलिप्त असलेले परिवर्तन हवे असेल,तर त्याला आधारभूत असलेल्या मूल्याची प्राणपणाने जपणूक करणारा मनुष्यही निर्माण झाला पाहिजे,हे ते पुरेपूर जाणून होते.त्या दृष्टीने त्यांनी केलेले प्रयत्न अल्पप्रमाणात का होईना यशस्वी होत असल्याचा भास होत होता.

पण १९४८ नंतर गांधीजींच्या स्वप्नातला हा नवा भारतीय माणूस एकाएकी गुप्त झाला.तो खरोखर अस्तित्वातच आला नव्हता काय,ही शंका आज अनेकांना बेचैन करीत आहे की प्रखर उन्हात मृगजळाचा भास व्हावा त्याप्रमाणे गांधीजींच्या तेजस्वी व्यक्तिमत्त्वामुळे त्यांच्या शिकवणुकीच्या कक्षेत आलेली माणसे त्या काळापुरतीच बदलली होती?या शेवटच्या प्रश्नातून एक मूलभूत प्रश्न डोळ्यांपुढे उभा राहतो. वासना आणि विकार यांचे अस्तित्व ही माणसाची प्रकृती आहे.जागृत आत्मशक्तीचे लेणे लाभलेल्या निवडक व्यक्ती या प्रकृतिधर्मावर विजय मिळवू शकतात,पण सर्वसामान्य माणसाचे अंतरंग गांधीजींना हवे होते.तसे बदलणे शक्य आहे काय? संत,प्रेषित,

क्रांतिकारक आणि मांगल्याचे उपासक हे स्वभावतःच स्वप्नाळू असतात.निर्दोष मानवी संस्कृतीचे एक रम्य, भव्य स्वप्न त्यांच्या डोळ्यांपुढे तरळू शकते. "ईशावास्यमिदं सर्वम" हे अधिकारवाणीने सांगणाऱ्या वैदिक ऋषींनी हे स्वप्न पाहिले होते! बुद्ध,ख्रिस्त आणि ज्ञानेश्वर,कबीर यांच्या प्रज्ञेलाही त्याचे दर्शन झाले होते.अगदी अलीकडच्या काळात टॉलस्टॉय टागोरांसारखे प्रतिभावंत या स्वप्नाच्या ध्यासाने धुंद झालेले आपण पाहिले आहेत.दैनंदिन क्रियाशील जीवनात गांधीजी याच स्वप्नाचा मागोवा घेत राहिले,त्यांच्या हयातीत हे स्वप्न वास्तवाच्या कुशीत विसावण्या

करता येत आहे, असा गोड भास लक्षावधी लोकांना झाला.पण गेल्या वीस वर्षांतला प्रत्यक्ष अनुभव अगदी निराळा आहे.भारतीय संस्कृती आणि गांधीजींची शिकवण ह्या दोन तटांमधून वाहू लागलेली ही निर्मळ स्वप्नसरिता अवघ्या दीड तपात पूर्णपणे गढूळ होऊन जाईल.ज्या मूल्यांपुढे पिढ्यानपिढ्या लोक नतमस्तक होत होते ती सर्व हा हा म्हणता पायदळी तुडविली जातील. त्याग आणि सेवा या मंत्रांचे पठण जिथे सुरू होते,तिथे भोग आणि स्वार्थ यांच्या नंग्या नाचाला टाळ्या पडत राहतील,भ्रष्टाचार आणि काळाबाजार ही जीवनाची अविभाज्य अंगे हेऊन बसतील,असे भविष्य १९४७ पूर्वी कुणी वर्तविले असते,तर त्याची निःसंशय वेड्यात गणना झाली असती.

आंतरिक प्रकाशाची पूजा

मात्र आज सभोवतालचे दाहक वास्तव करुणरवाने एकच गोष्ट सांगत आहे ती ही की गांधीजींच्या काळात भारतीय मनुष्याचे अंतरंग बदलत आहे,असे जे दृश्य दिसत होते,तो केवळ एक भास होता! 

"मनुष्याच्या अंतरंगात नेहमीच एक पशु दबा धरून बसलेला असतो." असे शोपेनहारने म्हटले आहे. भारतीय मनातल्या या पशूला काही काळ माणसाळविण्याचे काम गांधींनी केले. पण स्वातंत्र्य मिळून सत्ता आणि संपत्ती यांची प्रलोभने पुढे येताच त्या पशूचा हिंस्रपणा पूर्णत्वाने जागा झाला!

माणसातले पशुत्व आणि माणुसकी यांचा हा संघर्ष सनातन आहे.त्याचे अस्तित्व प्रत्येक व्यक्तीने आणि प्रत्येक पिढीने मान्य केले पाहिजे.हे अस्तित्व हेच एका दृष्टीने संस्कृतीचे उगमस्थान आहे.आजची मानवी संस्कृती शतकानुशतके समर्थ सज्जनांनी केलेल्या उग्र तपश्चर्येचे फळ आहे.माणसाची प्रकृती आणि मानवी संस्कृती यांच्यामधल्या संघर्षाचे सूत्र कालमानानुसार बदलले,तरी तो संघर्ष जसा अनादी तसाच अनंत आहे. शिवाय हीही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की कोणतीही नवी संस्कृती चटकन् समाजाच्या पचनीं पडत नाही. तिचा जेवढा अंश सर्वसामान्य माणसाच्या प्रकृतीमध्ये मिसळून एकरूप होतो,तेवढाच समाज परिवर्तनाला पोषक ठरतो.

गांधीजींच्या मागून तितक्याच समर्थपणाने सामाजिक धर्मबुद्धीची बीजे जनमनात फुलवीत रहाणारा प्रभावी नेता भारताला मिळाला असता तर आज अगतिक झालेल्या आपल्या सामाजिक मनाची ही दुर्दशा कदाचित टळली असती.पण इतिहास उच्चरवाने नेहमीच सांगत आला आहे."सारे महापुरुष एकाकी असतात.! त्यांना त्यांच्या तोडीचे वारस कधीच लाभत नाहीत. महामानवांची परंपरा अखंडित राहणे नियतीला मंजूर नाही."

ते काहीही असो! ज्या सामान्य मनुष्यावर गांधीजींनी जीवापाड प्रेम केले,त्यांनी सभोवताली पसरलेल्या दाट धुक्यातही आकाशात सूर्य प्रकाशत आहे ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे.तत्कालिक सुखाच्या हव्यासाने उफाळून येणाऱ्या मनोविकारांचा माणूस गुलाम झाला,तर या यांत्रिक युगात तो आपला आत्मा पूर्णपणे गमावून बसेल!ज्या समाजाला श्रेष्ठ प्रकारचे नैतिक अधिष्ठान असते,तिथेच असामान्याप्रमाणे सामान्यानाही समृद्धी आणि शांती यांचा लाभ होण्याची शक्यता अधिक असते.नैतिक मूल्यांचे परिपालन ही गांधीजींच्या दृष्टीने सर्व मानवी व्यवहार सुखप्रद होण्याची गुरुकिल्ली आहे म्हणून भोवताली दिसणाऱ्या विपरीत दृश्यांनी मन गोंधळू न देता गांधीजींनी दिलेला मूल्यांच्या जपणुकीचा वारसा यथाशक्ति संभाळणे हे प्रत्येक सामान्य मनुष्याचे कर्तव्य आहे.

यासाठी त्याला अंतर्मुख व्हावे लागेल,त्याग करावा लागेल,सामाजिक धर्मबुद्धीच्या ध्रुवताऱ्यावर दृष्टी ठेवून आपली जीवननौका हाकारावी लागेलं.कठोर कायद्यांनी किंवा रक्तरंजित क्रांतीने समजाचे बाह्यरूप बदलते.पण त्याचे अंतरंग तसेच रहाते.

विज्ञानाचे राक्षसी सामर्थ्य आणि यंत्रयुगामुळे निर्माण होणारी भावनांची शुष्कता यांच्या कात्रीत सापडून मानवी आयुष्य हे केवळ जंतूचे जीवन होऊ नये असे ज्याला ज्याला वाटत असेल, त्याने त्याने सामाजिक धर्मबुद्धीशिवाय मानवाला यापुढे दुसरा तरणोपाय नाही, हे लक्षात ठेवले पाहिजे

भारतीय मन गेल्या वीस वर्षांत ज्या आंतरिक प्रकाशाच्या पूजेला अंतरले आहे,त्याचा या गांधी जन्मशताब्दीच्या वर्षात आपण सर्वांनी पुन्हा शोध केला पाहिजे,हा प्रकाशच आजच्या असुरक्षित जगात सामान्य मनुष्याचा खराखुरा आधार होऊ शकेल.


…………..।।।।……


१,२ : हा लेख १९६९ साली 'धरती' या विशेषांकात प्रसिद्ध झालेला असल्याने त्या काळानुसार आलेले संदर्भ.

|| २ ||

अलीकडेच तरुण पिढीच्या काही प्रतिनिधींशी मनमोकळेपणाने गप्पा गोष्टी करण्याचा योग आला.हे सारे विद्यार्थी होते.पदवीधर झालेले आणि पुढील विद्याभ्यासात व पसरलेल्या अफाट विश्वाचं निरीक्षण करू लागावं त्याप्रमाणं आजच्या कडू गोड जीवनाचा सामाजिक सुखदुःखांत रस घेणारे,पंख फुटलेल्या पिलांनी घरट्याबाहेर पडून सभोवताली अनुभव घेणारे आणि त्याचा अन्वयार्थ लावण्याचा प्रयत्न करणारे असे हे तरुण होते.बोलता बोलता तरुण पिढीच्या सध्याच्या वैफल्याच्या मुळाशी कोणकोणती कारणे आहेत हा विषय निघाला.आपल्या मनातील सारी शल्यं त्यांनी सांगावीत म्हणून ती थोडक्यात शब्दबद्ध करण्याची मी त्यांना विनंती केली.आढेवेढे न घेता त्यांनी आपले टिपण माझ्याकडं दिलं.

या तरुण अंतःकरणांना सलणाऱ्या अनेक शल्यांपैकी एक त्यांच्याच शब्दांत सांगतो.

"केवळ तात्त्विक चर्चा करणारे पण ती तत्त्वे आचरणात न आणणारे मागच्या पिढीतले लोक,विशेषतः केवळ भाषणबाजी करणारे गांधीवादी आम्हाला भेटतात,त्या वेळी आम्हाला त्यांच्याविषयीच नव्हे तर त्यांच्या तत्त्वज्ञानाविषयी आणि पर्यायानं गांधींविषयी घृणा निर्माण होते."

गांधी जन्मशताब्दीचे समारंभ आता सर्वत्र साजरे होत असताना सुबुद्ध आणि सुशिक्षित तरुणांच्या तोंडून “आम्हाला गांधीविषयी घृणा वाटते." असे शब्द निघावेत याचं मला जितकं आश्चर्य वाटलं तितकंच दुःख झालं. स्वभावतः मी व्यक्तिपूजक नाही.विभूतिपूजेच्या प्रथेमुळे भारतातल्या सामान्य मनुष्याचं मनं खुरटं राहिलं आहे याची जाणीव मला आहे.त्यामुळं टिळक - गांधी असोत अथवा गेल्या दीडशे वर्षात आपल्या देशात होऊन गेलेले इतर थोर पुरुष असोत,त्यांच्याविषयी माझ्या मनात अत्यंत आदर असला तरी अंधभक्ती मात्र मुळीच नाही. प्रत्येक महापुरुषाचं जीवन भविष्यकालावरच्या निकषांवर घासलं गेल्यानंतर मगच त्यात सोनं किती आणि हीण किती हे कळू शकतं;हे सत्य मला अपरिचित नाही.पण गांधीजींच्या अभूतपूर्व कर्तृत्वाच्या काळात विशीपासून पन्नाशीपर्यंत माझं आयुष्य गेलं. साहजिकच,या तरुणांच्या मनातली गांधीजींविषयीची अप्रीती (घृणा हा शब्द त्यांनी अनवधानानं वापरला असावा असं मी समजतो) चटकन् समजावून घेणं मला कठीण गेलं.

या तरुण मंडळींचा हा राग पूर्वग्रहदूषित नव्हता.ज्याचं जळतं त्याला कळतं हे मनाला जाणवण्याइतकी त्यांच्या अंतरींची व्यथा स्पष्ट दिसत होती.

मी त्यांच्या आक्षेपांचा विचार करू लागलो. पहिला प्रश्न होता गांधीवादाचा.त्याचं उत्तर गांधीजींच्या शब्दांत देणं फार सोपं काम आहे.गांधीवाद म्हणून एक स्वतंत्र तत्त्वज्ञान आहे हे खुद्द गांधींनाच मान्य नव्हतं।

अपुरे राहिलेला भाग पुढील लेखामध्ये….।




7/15/26

एका महामानवाचे एक भव्य स्वप्न ! A grand dream of a great man!

त्यांचं म्हणणं एका दृष्टीने अगदी बरोबर आहे. गांधीजींची विचारप्रणाली भारतीय संस्कृतीला आधारभूत असलेल्या तत्त्वांशी मिळती जुळती आहे; इतकंच नव्हे तर,विविध धर्मांतल्या मध्यवर्ती शिकवणुकीशीही तिचं अगदी जवळचं नातं आहे, 

'धर्मादर्थश्च कामश्च सधर्मः किं न सेव्यते' (धर्मापासून अर्थ आणि काम या दोहोंचाही लाभ होतो, असं असून, धर्माचा अवलंब मानव का करीत नाही?) हा व्यासांचा आर्त आक्रोश विसाव्या शतकातल्या गांधींच्या तोंडीही शोभून दिसतो यात शंका नाही.

व्यक्तिजीवनाची कोंडी फोडून धर्मबुद्धीनं दैनंदिन सामाजिक जीवनात प्रवेश केला पाहिजे,म्हणून गांधींनी आमरण जीवाचं रान केलं.त्यांच्या शिकवणुकीचा आत्मा विश्वात्मक धर्मबुद्धी हाच आहे.या धर्मबुद्धीभोवती परिस्थितीला अनुरूप अशा नानाविध चळवळी त्यांनी उभ्या केल्या.या चळवळींच्या अनुषंगानं जे कर्मकांड निर्माण झालं,तेच त्यांच्या अनेक अंध अनुयायांनी गांधीवाद म्हणून उराशी कवटाळलं.प्रत्येक धर्माच्या बाबतीत दुर्दैवानं असंच घडत आलं आहे.मग बिचारी गांधींची धर्मबुद्धी तरी त्याला अपवाद कशी होणार? हा हा म्हणता गांधीवादाचा गंडा बांधणारे खरेखोटे शिष्य निघाले.ज्यांना जमले त्यांनी आपले मठ स्थापन केले देवळं बांधली.साहजिकच पुजाऱ्यांची वर्दळ वाढली. नैवेद्याची अडचण पडू नये म्हणून सर्वप्रकारची दक्षता घेण्यात येऊ लागली.काहींनी श्रद्धेनं,अनेकांनी प्रवाहपतित म्हणून आणि पुष्कळांनी लाभ उठविण्याच्या उद्देशानं,निर्जीव गांधीवादाच्या धुपारत्या काकडआरत्या तार स्वरात म्हणायला सुरुवात केली.हे जे विपरीत घडलं,त्याचा दोष गांधींना किंवा त्यांच्या शिकवणुकीला देणं हे अतिशय अन्यायाचं होईल.असा दोष देण्यानं संन्याशाला चोर म्हणून सुळी देण्याचं क्षणिक समाधान लाभेल;पण खरे अट्टल चोर चोऱ्या करायला मोकळेच राहतील.

त्या विद्यार्थ्यांच्या अप्रीतीचं दुसरं लक्ष्य होतं गांधीजींच्या तत्त्वज्ञानाची पोपटपंची करीत रहाणारे कार्यकर्ते.सर्व गांधीवादी कार्यकर्त्यांवर हा आरोप करता येणार नाही, हे माझ्या तरुण मित्रांना समजावून सांगणं सोपं आहे. विनोबा,जयप्रकाश यांसारख्यांची नुसती नावं घेतली किंवा भूदान ग्रामदान यांसारख्या चळवळींचा उल्लेख केला तरी,या आरोपातली अतिव्याप्ती सहज लक्षात येईल.मात्र एक गोष्ट कबूल केलीच पाहिजे -गांधीजी होते तोपर्यंत त्यांच्या सर्वसामान्य अनुयायांमध्ये सामाजिक परिवर्तनाची जी सक्रिय तळमळ होती,ती गांधीजींच्या मृत्यूनंतर फार लवकर संपुष्टात आली. जनतेच्या सुखदुःखांशी सहृदयतेनं संपर्क साधणारे, तिच्या मोडक्या-तोडक्या जीवनात मिसळून जाऊन ते अधिक विशुद्ध व समृद्ध करण्यासाठी धडपड करणारे, परार्थ हाच परमार्थ आहे या भावनेनं सेवेचं एक लहानसं क्षेत्र निश्चित करून,त्यात अखंड काम करीत राहणारे गांधीवादी कार्यकर्ते गेल्या वीस वर्षांत दुर्मीळ होत गेले. दिल्लीपासून गल्लीपर्यंत जो तो

सोयीस्करपणे गांधीचं नाव वापरू लागला,ते नाव हे एक चलनी नाणं बनलं. १९४७पूर्वी हे नाणं अस्सल सोन्याचं होतं.स्वार्थी लोकांनी त्यातलं सोनं नाहीसं करून ते नाणं कथलाचं बनवलं आहे.

असं होण्याची कारणं अनेक आहेत.ती फार गुंतागुंतीची आहेत.त्या सर्वांची मीमांसा इथं करणं अप्रस्तुत होईल. मात्र,एका कारणाचा आवर्जून उल्लेख केला पाहिजे. मानवी जीवनाचा ओघ कोणत्या दिशेनं वाहात आहे, भारतीय माणसाचं मन किती झपाट्याने बदलत आहे. याची फिकीर न करता केवळ गांधीजींना प्रिय असलेल्या तत्त्वांचा पुन्हापुन्हा उच्चार करून यापुढे काम भागणार नाही.प्रत्येक महापुरुषाचा त्याच्या  शिकवणुकीची फोलं पाखडीत बसणाऱ्या शिष्य-प्रशिष्यांकडून पराभव होतो अशी इतिहासाची साक्ष आहे.तो अनुभव गांधींनाही घ्यावा लागला. गांधींच्या या पराभवाचं कारण भारतीय सामाजिक मनाच्या दुबळ्या आणि निष्क्रिय आदर्श पूजेतच सापडेल.कुठल्याही क्रांतिकारी तत्त्वज्ञानाचा आपण जयजयकार करतो;पण ते तत्त्वज्ञान आचरणात उतरविण्याची वेळ आली म्हणजे,त्यातल्या सळसळणाऱ्या चैतन्याकडं आपण पाठ फिरवतो आणि प्रेतं शृंगारावीत त्याप्रमाणं त्यातल्या कर्मकांडाचं आम्ही स्तोम माजवीत सुटतो.

डॉ.राममनोहर लोहिया यांनी भारतातल्या मार्क्सवादाविषयी जे लिहिलं आहे,तेच कमी अधिक प्रमाणात इथल्या गांधीवादालाही लागू पडेल.डॉ. लोहिया म्हणतात,"मार्क्सवादी विचारसरणीची दोन मुख्य अंगं आहेत.पहिलं,अर्थव्यवस्था बदला म्हणजे सारं काही बदलेल.भाषा,जातिप्रथा,नैतिकता आदीसंबंधींचे सारे प्रश्न सुटतील.दुसरे,अर्थव्यवस्था बदलण्यासाठी वैयक्तिक मालकीच्या उत्पादक साधनांचा व संपत्तीचा नाश करणं जरूर आहे.तसंच,त्याकरता यंत्रविज्ञान व औद्योगीकरण आवश्यक आहे.क्रांतिकारी मार्क्सवादी व्यक्तिगत,

उत्पादक संपत्तिसाधनांच्या विनाशाला महत्त्व देतो.हे क्रांतिकारक कार्य करीत असताच भाषादी प्रश्नही क्रांतिकारक पद्धतीनं सोडवितो.षंढ मार्क्सवाद अशी समजूत करून घेऊन बसतो की,विज्ञानीकरण आणि उद्योगीकरण केलं की, आर्थिक व्यवस्था बदलेल.आणि आपोआप बाकी सारे प्रश्न सुटतील.स्वातंत्र्योत्तर भारताने धड गांधीवादाला आपले गुरू केले नाही;की क्रांतिकारी मार्क्सवाद स्वीकारला नाही.फक्त षंढ मार्क्सवाद त्याने पत्करला." ('जनमनगण' पृ. २८)

डॉ. लोहियांनी मार्क्सवादाचे जे दोन वर्ग कल्पिले आहेत.तसेच गांधीवादाचेही क्रांतिकारी गांधीवाद आणि भोंगळ गांधीवाद असे दोन स्वच्छ भेद पडतात. गांधीवादाचे क्रांतिकारकत्व १९४७ पर्यंत जनतेला जाणवत होतं;पण गांधींच्या देहावसानानंतर तो ज्वलंत स्फुलिंग हां हां म्हणता विझला.सर्वसामान्य माणसाच्या दृष्टीने गांधीवाद तरुण पिढीला आकृष्ट करील हे शक्यच नव्हतं.एखाद्या संताच्या समाधीपाशी भलीमोठी जत्रा

भरावी,पण कुणालाही त्या संतांच्या शिकवणुकीचे स्मरण असू नये,फक्त त्या जत्रेच्या निमित्ताने भरलेल्या बाजाराची चलती व्हावी,असा काहीसा प्रकार गेल्या वीस वर्षांत वाढत गेला. 

मार्क्सवादाचा सारा रोख ज्याप्रमाणं उत्पादनाची साधनं आणि त्यांच्याद्वारे निर्माण होणारी संपत्ती यातून खास व्यक्तिगत हक्क नाहीसे करण्यावर आहे,त्याप्रमाणं गांधीवादाचं मुख्य लक्ष व्यक्तिमनाचं उद्बोधन,सामाजिक मनाच्या संवेदनशीलतेचं संवर्धन आणि या दोन्हींच्याद्वारे चिरकालिक होऊ शकेल असे सामाजिक परिवर्तन या गोष्टी आहेत.गांधीजींना नवा मनुष्य घडवायचा होता. समाजासाठी व्यक्तीनं जाणीवपूर्वक त्याग करायला शिकले पाहिजे हे या परिवर्तनाच्या प्रक्रियेचे पहिले सूत्र आहे. मार्क्सला समाजरचना आमूलाग्र बदलायची होती. गांधींनाही समाजव्यवस्थेत मूलभूत बदल हवे होते; पण मार्क्सचा मुख्य रोख आहे भौतिक परिवर्तनावर.उलट गांधीजींची श्रद्धा आहे आत्मिक परिवर्तनावर. रक्तरंजितक्रांतीनं भौतिक परिवर्तन घडवता येतं;पण आत्मिक परिवर्तनात अभिप्रेत असतो तो मनुष्याच्या स्वभावातला बदल- जीवनाकडं पाहण्याच्या त्याच्या दृष्टिकोनातला पालट, तोही केवळ वरवरचा नव्हे,अगदी आतून उचंबळून आलेला.संस्कृतीच्या पातळीवर स्थिर होणारा.अशा परिवर्तनाकरता पिढ्यान् पिढ्या मनुष्य ज्या संस्कारात वाढला त्यांच्याहून अगदी भिन्न असे संस्कार त्याच्यावर करावे लागतात.नवा समाज अस्तित्वात आला म्हणजे,नवा मानव निर्माण होईल ही मार्क्सची कल्पना.ती वास्तवाशी कितपत सुसंगत आहे याचं उत्तर रशिया,चीन वगैरे साम्यवादी राजवटीतल्या सामान्य मनुष्याचं आंतरिक जीवन देऊ शकेल.

क्रांतिकारी गांधीवादआपल्या देशात गेल्या वीस वर्षांत अस्तित्वात असता तर,नवा मानव घडविण्याच्या गांधीजींच्या स्वप्नाला वास्तवाचा निकष लावून त्याचं मूल्यमापन करता आलं असतं.पण तशा प्रकारचे प्रयत्न शासनाकडून आणि जनतेकडून मोठ्या प्रमाणात मुळीच झाले नाहीत.साहजिकच,आजच्या तरुण पिढीला ज्याचं दर्शन घडतं तो गांधीवाद कोणत्याही बाजूनं जवळचा वाटू नये यात अस्वाभाविक असं काय आहे? यांत्रिकीकरण व औद्योगिकीकरण यांच्याद्वारे येणाऱ्या समृद्ध जीवनाची अंधुक स्वप्नं तरुण पिढीला आकृष्ट करीत आहेत.या स्वप्नांचं क्रांतिकारी गांधीवादाशीसुद्धा जिथं जवळचं नातं नाही,तिथं निर्जीव गांधीवादाला कोण धूप घालणार?

क्रांतिकारी गांधीवाद म्हणजे मानवाला नव्या उच्च संस्कृतीच्या पातळीवर नेण्याचा प्रयत्न.मनुष्यस्वभाव मूलतः स्वार्थी आहे.तो संपूर्णतः बदलता येईल का? हा या बाबतीतला मोठा वादग्रस्त प्रश्न आहे.गांधीजींची माणसाच्या अंतःकरणातल्या मांगल्यावर (Divine in man) पराकोटीची श्रद्धा होती.ती नसती तर, आफ्रिकेतल्या सत्याग्रहापासून नौखालीतल्या पदयात्रेपर्यंत त्यांच्या जीवनाचं जे महाभारत घडलं ते घडू शकलं नसतं.श्रद्धेचं सामर्थ्य मोठं असतं हे मान्य केलं तरी,उत्कट श्रद्धा हा सामान्य मनुष्याचा स्थायी भाव असू शकतो का? हा प्रश्न अप्रस्तुत ठरण्याचं कारण नाही.मनुष्य अगदी विसाव्या शतकातला पढिक, पंडितसुद्धा प्रथमतःआपल्या वासनांचा गुलाम असतो. मग इतर भावनांचा,कोणत्याही,विशिष्ट श्रद्धेपेक्षा अमर्याद सुखोपभोगांची इच्छाच सामान्य मनुष्याच्या जीवनावर राज्य करीत आली आहे;अशी इतिहासाची साक्ष आहे.ही साक्ष खोटी मानून नव्या मानवी मनाच्या संस्कृतीची स्वप्नं पहाणं कितपत योग्य होईल? तो स्वप्नाळूपणा ठरणार नाही काय? इ.प्रश्न तरुणपिढीनं उपस्थित केले तर,त्यांची उत्तरं गांधीवादाच्या समर्थकांना द्यावीच लागतील.

काही व्यक्ती,काही प्रसंग,काही पुस्तकं,काही अनुभव माणसाला काहीकाळ उच्च पातळीवर नेऊ शकतात. पण तिथं तो दीर्घकाळ राहू शकत नाही.पाणी आपली पातळी शोधीत खाली जातं ना,तसं असतं सर्वसामान्य माणसाचं जीवन.स्वतःच्या स्वार्थी स्वप्नांनी त्याचा बहुतेक भाग व्यापलेला असतो.आपल्या वासना आणि सुखाच्या कल्पना यांचा लगाम सामाजिक धर्मबुद्धीच्या हाती देणं त्याला सहसा जमत नाही.हा अनुभव जमेला धरला म्हणजे,नव्या मानवाची जडण-घडण हे अत्यंत अवघड काम आहे हे कुणीही कबूल करील.गांधीजींनी या बाबतीत जे काही सिद्धान्त मनाशी बांधले ते स्वतःच्या अनुभवावरून.साहजिकच त्यांत एक मोठं न्यून राहिलं.

सूर्याप्रमाणं सतत प्रकाशणारी गांधीजींसारख्या महामानवाची आत्मशक्ती आणि काजव्याप्रमाणे अधूनमधून लुकलुकणारी सामान्य माणसांची आत्मशक्ती यांतील अंतर गांधीजींनी लक्षात घेतलं असतं तर फार बरं झालं असतं.भारतीय संस्कृतीचा टेंभा मिरविणाऱ्या या देशातल्या गेल्या दोन तपांतल्या अनुभवांनी गांधीजींच्या विचारसरणीतल्या वैगुण्यावर नेमकं बोट ठेवलं आहे.सध्या आपल्या देशाला भेडसावीत असलेला कुटुंबनियोजनाचाच प्रश्न घेऊ.या बाबतीतली सामान्य मनुष्याची दुर्बलता गांधीजींनी कधीच नीट जाणून घेतली नाही.माणसाच्या पहिल्या भुकेइतकीच दुसरी भूक अनियंत्रित असते.संस्कृतीनंही नियंत्रित न होऊ शकणारी एक जीवप्रवृत्ती या नात्यानंच माणसाच्या कामभावनेकडं आपण पाहिलं पाहिजे.

पण ही दृष्टी जशी प्राचीन संतांपाशी नव्हती,तशीच एका बाजूनं त्यांच्याशी संलग्न असलेल्या गांधीजींपाशीही नव्हती.

संततिनियमनाचा पुरस्कार पाश्चात्त्य देशात दीर्घकाळ सुरू आहे.१९२०-२५ च्या सुमाराला आपल्याकडं त्यासंबंधी थोडं लिहिलं बोललं जाऊ लागलं.पण सुशिक्षित समाजाचा दृष्टिकोनसुद्धा याबाबतीत त्या काळी दूषितच होता.संततिनियमनाची चर्चा हा काही गलिच्छ प्रकार आहे असे मानणारे चांगले चांगलें डॉक्टर त्याकाळात मी पाहिले आहेत.१९३६ मध्ये या चळवळीच्या एक अग्रगण्य पुरस्कर्त्या मागरिट सँगर भारतात आल्या.गांधीजींना भेटण्याकरता.सँगरबाईंची भूमिका गांधींनी मान्य केली नाही.या नाजूक व्यावहारिक प्रश्नाचा त्यांनी शुद्ध तात्विक दृष्टीनं परामर्श घेण्याचा प्रयत्न केला.

सँगरबाईंना गांधी म्हणाले,"स्त्री ही आपल्या पतीची किंवा पित्याची गुलाम नाही,पुरुषाने तिला गुलाम बनविले.व गुलामगिरीच्या सरावानं तिला त्यात भूषण वाटू लागले.स्त्री ही पुरुषाची गुलाम नव्हे ही माझी शिकवण माझ्या भगिनींना पटली तर हिंदुस्थानात संततिनियमनाचा प्रश्न उद्भवणार नाही.कामविकाराच्या तृप्तीसाठी पुरुष स्त्रीच्या जवळ जातो तेव्हा त्याचा यशस्वीपणे प्रतिकार करण्यास तिने शिकले पाहिजे. आपले शारीरिक संबंध सुरू रहावेत,आपल्या मागं मुलाबाळांचं लेंढार लागू नये असं म्हणणं म्हणजे केवळ कामलालसाच नव्हे काय? प्रजोत्पादन व्हायला नको असेल तर,स्त्री-पुरुषांनी शारीरिक संबंध ठेवताच कामा नये.तीन किंवा चार मुलं झाल्यानंतर पति- पत्नींनी शरीरसुखाचा मोह का सोडू नये? तेवढी मुलं होईपर्यंत त्या दोघांना विषयसुख काय कमी मिळालेलं असतं? दुसऱ्याची गुलामगिरी करताना माणसाला लाज वाटते, तशी विषयसुखाची करताना का वाटू नये?"

ही विचारसरणी कर्मठ पावित्र्यवादाची (Puritanism), स्त्रीला पुरुषाच्या तपश्चर्येच्या मार्गातली धोंड मानणाऱ्या प्राचीन ऋषिमुनींची आणि शरीरसुख हे पाप आहे ही परंपरागत कल्पना उरी बाळगणारांची आहे हे सहज लक्षात येईल.संयमाच्या अत्युच्च पातळीवरून गांधीजी स्त्री - पुरुष संबंधाकडं पाहतात.पण व्यवहारात कुठलीही उच्च तात्त्विक भूमिका हे स्वप्नरंजन ठरतं असा अनुभव आहे.गांधीजींनी सँगरबाईंना भारतीय मनुष्य, संयमानं संततिनियमन करील असा हवाला दिला.पण या गोष्टीला वीस वर्षं झाली नाहीत तोच या देशाला कुटुंबनियोजनाचा कार्यक्रम हाती घेणं भाग पडलं. लोकांनी गांधीजींचा संयमाचा उपदेश मुकाट्यानं ऐकून घेतला आणि प्रजोत्पादन पूर्ववत सुरू ठेवलं.गांधीजींनी अपेक्षिलेल्या संयमाचा एकदशांश भाग जरी आमच्यापाशी असता,तरी या देशाचं कोटकल्याण झालं असतं.गेली दहा वर्षं कुटुंबनियोजनाचे ढोल कानी कपाळी बडवले जात असताना,या कार्यक्रमावर पैसा आणि शक्ती भरपूर प्रमाणात.खर्च होत असताना, परिस्थितीत फारसा आशादायक बदल झालेला नाही. साऱ्या देशाची गोष्ट दूर राहू द्या.ज्या महाराष्ट्राला आपल्या बुद्धीचा आणि बुद्धिवादित्वाचा अभिमान आहे, जिथं रघुनाथराव कर्त्यांसारखा संततिनियमनाचा निःस्वार्थी, निधडा आणि कडवा प्रचारक पन्नास वर्षापूर्वी निर्माण झाला, तिथली लोकसंख्याही अजून कुटुंबनियोजनाला फारशी दाद देत असलेली दिसत नाही.१९५१ साली महाराष्ट्राची लोकसंख्या तीन कोटी ऐंशी लक्ष होती.आता १९७१ साली ती पाच कोटी होईल असे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी नुकतेच सांगितले.हे सारं लक्षात घेतलं म्हणजे,सामान्य मनुष्याच्या संयमाविषयी आणि त्याच्या नैतिक निग्रहाविषयी गांधीजींना वाटणारा विश्वास किती निराधार होता याची खात्री पटते.जी स्थिती स्त्री - पुरुष संबंधाची तीच दारूबंदीची.तीच लॉटरीसारख्या सभ्य द्यूतक्रीडेची.आहे रे आणि नाही रे या दोन वर्गांतल्या संघर्षाची. देशामध्ये भौतिक समृद्धी वाढत असली तरी,

तिच्या वाटपावर कोणत्याही प्रकारचे नैतिक नियंत्रण नाही.कायद्याची नियंत्रणे आहेत; पण ती फार दुबळी ठरत आहेत.वाघाला सुतळीन बांधून ठेवण्याच्या प्रयत्नासारखी,कायद्याला नेहमी अनेक पळवाटा असतात.पण नैतिक मूल्य नेहमी आपल्या पायाखालची एकच वाट आनंदानं तुडवीत जातात.मग ती कितीही काटेरी असोत.

"ज्याच्या हाती सत्ता तो पारधी" अशी देशातल्या उत्पादनांच्या साधनांची आणि त्यांच्याद्वारे निर्माण होणाऱ्या संपत्तीची स्थिती आहे.आपण तोंडानं लोकशाहीच्या,सामाजिक समतेच्या आणि आर्थिक न्यायाच्या मोठमोठ्या गप्पा मारतो,आणि त्या मारीत असतानाच बऱ्या वाईट मार्गाने गबर होणारे अनेक नवे धनिक वर्ग अस्तित्वात येत असलेले पाहतो.या नवधनिकांवर नियंत्रण घालण्याचं आणि काळ्याबाजाराच्या मुळावर कुऱ्हाड चालविण्याचं सामर्थ्य सरकारपाशी नाही.गांधींना अभिप्रेत असलेला नवा मानव या देशात पूर्वपिक्षाही अधिक दुर्मीळ होऊन बसला आहे.उलट खोऱ्यानं आपल्याकडं माती ओढावी त्याप्रमाणं सुप्तासुप्त मार्गांनी आपण अधिक श्रीमंत कसे होऊ,आपल्याला जास्तीत जास्ती चैन कशी करता येईल? पुत्रपौत्रांना कुबेराचा वारसा ठेवण्याची आपली इच्छा कशी सफल होईल,याचाच विचार धनवंतांच्या मनामध्ये घोळत असलेला दिसतो.श्रीमंती हा सुखाच्या मंदिराकडं जाणारा राजरस्ता आहे,यावर विश्वास नसणारा एक महत्त्वाचा वर्ग गांधींच्याकाळी होता. पण आता सोने,रुपे,नाणे, हेच प्रत्येकाचं आवडतं गाणं झालं आहे. "पैसा लुच्चा आहे" असं विनोबा म्हणतात.तो ज्यांच्यापाशी असतो त्यांनाही आपल्यासारखा करून सोडतो,असा दारुण अनुभव दुर्दैवानं या देशात येत आहे.साहजिकच उच्चार आणि आचार यांच्यात पूर्वी कधीही दिसली नसेल अशी अक्राळ विक्राळ घोर दरी पसरल्याचं भयानक दृश्य सामान्य मनुष्य पहात आहे. या दरीच्या दर्शनानं भोवळ आलेल्या तरुण पिढीनं गांधीवाद आणि गांधीवादी कार्यकर्ते यांच्याविषयी अप्रीती दर्शवावी यात नवल नाही.

गांधीवाद व मार्क्सवाद ही दोन्ही परस्परविरोधी तत्त्वज्ञानं आहेत असं मानलं जातं.पण त्यांच्या अंतरंगात एक समान जिव्हाळ्याचा धागा आहे.तो म्हणजे मानवाविषयीची करुणा,सामान्य मनुष्याविषयीचा कळवळा,त्या सामान्य मनुष्याच्या सुखानं जगण्याच्या हक्कावर धनवंत,बलवंत आणि बुद्धिमंत वर्गांकडून होणाऱ्या आक्रमणाला असलेला पोटतिडकीचा विरोध. या दोन्ही तत्त्वज्ञानांचा केवळ गाभा लक्षात घेऊन, त्यांचा खराखुरा समन्वय करण्याचा प्रयत्न स्वराज्यप्राप्तीनंतर आपण केला असता,तर देशात आज दिसणारी अभद्र चित्रं रंगविण्याचं धाडस काळपुरुषाला झालं नसतं.अज्ञान,दारिद्र्य,विषमता,धर्मभोळेपणा या गोष्टी काही मूठभर सज्जनांकडून सहजासहजी नष्ट होण्याइतक्या वरवरच्या नाहीत.या विषवृक्षांची पाळंमुळं जशी कालबाह्य झालेल्या समाजरचनेत खोलवर पसरलेली आहेत,तशीच त्या रचनेत बद्ध झालेल्या दुर्बल मानवी मनातही विखुरलेली आहेत.ही पाळमुळं खणून काढण्याचं काम पिढ्यानपिढ्या करावं लागणार आहे. व्रतस्थ वृत्तीनंआणि बुद्धिवादी भूमिकेवरून आपली मांड पळभरही चळू न देता शे-दोनशे माणसांपैकी एखाद्यानं जरी निष्ठेनं या कामाला स्वतःला वाहून घेतलं तरी, त्याचा त्याग,चारित्र्य आणि ध्येयवाद यांच्यापासून सामान्यांना स्फूर्ती मिळते,धुळीवर खिळलेली त्यांची दृष्टी नकळत वर वळते.

स्वातंत्र्योत्तर काळात आपल्याकडे घडायला हवं होतं ते हे.पण दुर्दैवानं ते घडलं नाही.अर्धकच्चा मार्क्सवाद आणि अर्धकच्चा गांधीवाद यांच्या मिश्रणातून संधीसाधूंनी आणि प्रवाहपतितांनी आपल्याला सोयीस्कर असं नवं कोरं करकरीत तत्त्वज्ञान बनवलं, या ढोंगी तत्त्वज्ञानानं देशापुढल्या सर्व समस्या जटिल आणि अवघड करून टाकल्या आहेत.तरुण पिढीला गांधीजींचं आकर्षण वाटत नाही याचं मुख्य कारण तिची दृष्टी  सभोवतालच्या परिस्थितीवर खिळली आहे.तिला पावलोपावली बोचणारे आणि पायांची चाळण करणारे अनेक काटे ज्या पिढीचे गांधी हे प्रमुख नेते होते त्या पिढीनंच पेरले आहेत याची तिला जाणीव आहे. 

सैनिकांच्या पळपुटेपणामुळं लढाईत अपयश येतं,पण त्या पराभवाची इतिहास नोंद करतो ती सेनापतीच्या नावानं.गांधीजींच्या बाबतीत नेमकं तेच झालं आहे.

परंतु नुसत्या चडफडाटानं,आदळ आपटीनं किंवा वैतागाच्या आणि वैफल्याच्या आहारी जाऊन तरुण पिढीपुढले अवघड प्रश्न सुटणार नाहीत.गांधींच्या अनुयायांनी त्यांच्या मूलगामी जीवनदृष्टीपेक्षा तिच्या अनुषंगानं निर्माण झालेल्या कर्मकांडाला महत्त्व दिलं. हा दोष गांधींचा नाही.भारतीय माणसाच्या परंपरागत दुबळ्या मनाचा आहे.कोणाही मध्यस्थाची मदत न घेता, कुणाही भाष्यकाराला वाट न पुसता,तरुणांनी गांधीविचारांचा मागोवा घेतला तर,त्यांना एका महान आत्म्याचं दर्शन होईल.त्या आत्म्याच्या अंतरंगातून पाझरणाऱ्या करुणेची जाणीव झाल्यावर आपण एका महासागराच्या तीरावर उभे आहोत असा त्यांना भास होईल.दुर्दैवानं गांधीजींना दैनंदिन राजकारणात, समाजकारणात,अर्थकारणात सदैव बुडून रहावं लागलं. दुय्यम सुधारणांकरिता त्यांची किती तरी शक्ती खर्ची पडली.प्रतिभावान कवीनं घरातल्या जमाखर्चाचा मेळ बसावा म्हणून सारा बाजारहाट स्वतः करीत सुटावं तसा काहीसा हा प्रकार झाला;पण आपल्या अंतरंगात गांधी उद्याच्या निर्भय आणि निर्मळ मानवाचं जे भव्य स्वप्न पाहात होते,त्यात जशी बुद्ध,ख्रिस्ताची करुणा होती तशी यंत्रयुगातल्या संताची प्रज्ञाही होती.

मनुष्य हा दोन पायांवर चालणारा पशू नाही.प्रयत्नानं उच्च पातळीवर त्याला जाता येतं. ती पातळी गाठण्याची तीव्र इच्छा त्याच्या मनात निर्माण करणं ही विसाव्या शतकातल्या मानवाची मुख्य गरज आहे, हे गांधींनी जाणलं होतं. त्यांच्या दृष्टीनं सारी माणसं सारखी होती. 

केवळ परमेश्वराची लेकरं म्हणून नव्हे,तर या जगात नांदायला आलेले स्खलनशील पण स्वप्नवेडे जीव म्हणून,या माणसांनी परस्परांशी मिळत जुळत घेतल्याशिवाय,सर्वांच्या सुखदुःखांचा काला करून तो चविष्टपणानं खाण्याची सवय स्वतःला लावून घेतल्याशिवाय,मानवजातीला स्वास्थ्याची आशा नाही.

भानवाला शांतिसुखाची आशा नाही,याची दखल राजकारणाशी संबंध आलेल्या जगातल्या दुसऱ्या कोणत्याही नेत्यानं घेतलेली नाही.दोन माणसं,दोन समाज,दोन राष्ट्र बंधुभावान जोडली गेल्याशिवाय यापुढं मानवाला भवितव्य नाही ही जाणीव गांधीजींच्या मनी मानसी सतत तेवत राहिली.तिचं मर्म तरुणांनी आत्मसात केलं नाही तर,गांधींच्या तत्त्वज्ञानातली आर्तता आणि ओलावा यांचा स्पर्श त्यांच्या मनांना होणार नाही.

दुर्दैवानं भारतीय सामाजिक मनाच्या पूर्वजन्म, आणि कर्मफल,दैववाद आणि धर्मभोळेपणा,स्वार्थ आणि कर्तव्यशून्यता,स्वप्नाळूपणा आणि विज्ञानविन्मुखता यांच्या कातऱ्यांत भारतीय सामाजिक मनाच्या शतशः चिंधड्या होऊन गेल्यामुळं,त्याला गांधीजींच्या तत्त्वज्ञानाचा गाभा पचवता आला नाही.त्यामुळं गांधीजी या जगातून निघून जाताच त्यांच्या तत्त्वज्ञानातलं चैतन्य हरपलं.ज्या आदर्शाला गांधीजी सहज हात घालू शकत होते,त्याच्याकडं वर मान करून पाहण्याची हिंमतही त्यांच्या नामधाऱ्या अनुयायांना आणि खुज्या देशबांधवांना राहिली नाही.पण हा काही गांधींच्या शिकवणुकीचा पराभव नव्हे.फार चांगलं बी रेताड जमिनीत पेरलं गेलं एवढाच त्याचा अर्थ.

बाह्यतः धर्मनिष्ठ पण अंतरी स्वार्थपरायण असलेल्या आमच्यातल्या पंडितांचा,धनवंतांचा, पुढाऱ्यांचा संकुचित दृष्टिकोन कायम ठेवून तरुणांच्यापुढील समस्यांची दाहकता कमी होणार नाही.गांधीजींनी जे जे सांगितलं त्यातली फोलं पाखडून सत्य घेणं आणि त्या सत्त्वाच्या सहाय्याने सामाजिक परिवर्तन घडवणं हे १९४७ नंतरच्या जाणत्या पिढीचं काम होतं.या पिढीनं गेल्या दहा-वीस वर्षांत देशात लोकशाहीचा आणि समाजवादाचा डांगोरा पिटला,पण शतकेच्या शतके या देशात वेदघोष घालू असूनही सामान्य मनुष्य जसा अडाणी राहिला,तसा मोठमोठ्या तत्त्वांच्या जल्लोषात तो अजूनही कोरडाच राहिला आहे.समाजवादी मूल्यं आपणाला प्रामाणिकपणे आचरणात आणायची असतील तर धनिकांनी,बुद्धिमंतांनी आणि वरिष्ठ वर्गीयांनी सर्वसामान्य मनुष्यापेक्षा स्वतः पाशी जे जे अधिक असेल ते ते इतरांना मिळावं म्हणून समर्पण भावनेनं देण्याची तयारी दर्शविली पाहिजे.नव्या मानवतेच्या स्पर्शानं उजळलेल्या बुद्धिनिष्ठ भूमिकेशिवाय हे घडणं शक्य नाही.

मार्क्सवादाच्या मार्गानं आलेला समाजवाद यांत्रिकीकरण व औद्योगिकीकरण करील. संपत्तीची समान वाटणी व्हावी म्हणून नवी सामाजिक चौकट ठोकून ठोकून घडवील,पण हे किंवा अशा प्रकारचे काही शांततापूर्ण मार्गांनी व्हायचे असेल तर,सामाजिक मनाची बधिरता नष्ट करून त्याला संवेदनशील आणि क्रियाशील करणे हा गांधींचा मार्ग - त्या मार्गावरली चाल कितीही कष्टप्रद असली तरी आपल्याला पत्करला पाहिजे. हा एकदम डोळ्यांत भरणारा नाही.तो आहे भिजवणीच्या पावसासारखा,आता नव्या सामाजिक मनाची जडण घडण घरात,शाळांत,महाविद्यालयात, कलाक्षेत्रात,साहित्यालयात,मंदिरात सर्वत्र होत राहिली पाहिजे.तरच ज्या चिरंतन मानवी मूल्यांवरल्या श्रद्धेमुळं गांधीजींनी या देशाला स्वातंत्र्यप्राप्तीचा अभिनव मार्ग दाखविला,त्या श्रद्धेची पताका खांद्यावर घेऊन सुखी आणि समाधानी समाजाचं स्वप्न साकार करण्याकरिता तरुण पिढीला धडपडता येईल.

वि.स.खांडेकर एका महामानवाचे एक भव्य स्वप्न,गांधी नावाचे महात्मा,संपादक - रॉय किणीकर,साहाय्यक- अनिल किणीकर,डायमंड पब्लिकेशन.

मार्क्सवाद आणि गांधीवाद यांच्या या तात्विक अथवा व्यावहारिक वैगुण्यांचा काथ्याकूट करण्याऐवजी या दोन समर्थ विचारप्रणालींचा जीवनाच्या संदर्भात कसा उपयोग करून घेता येईल,हे नव्या पिढीनं जरूर पाहायला हवं.म्हणून गांधीवादाविरुद्ध कुरकुरणाऱ्या तरुणांना मी म्हणेन, "माझ्याहून तुम्ही शतपटीने भाग्यवान आहात. मी विद्यार्थी होतो तेव्हा,या दोन्ही महापुरुषांचे संस्कार आम्हाला मिळणं अशक्य होतं, मार्क्स होऊन गेला होता.पण आपल्या देशातल्या मोठमोठ्यांना त्याचा पत्ता नव्हता.गांधीचं महात्मायन पुढं घडायचं होतं.सुदैवानं ही दोन्ही जिवंत, ज्वलंत, तत्त्वज्ञानं केवळ कागदावरली नव्हेत;हाडामांसाच्या माणसांच्या जीवनात उतरलेली,राष्ट्रांचे चेहरेमोहरे बदलून टाकण्याची किमया करणारी - तुम्हांला लाभली आहेत. या दोन्ही महासागरांत अवगाहन करा.या दोन महासागरांच्या दरम्यान मोठं वाळवंट पसरलं आहे याची मला जाणीव आहे.पण या वाळवंटातून तुम्हाला मोठा कालवा खोदून काढला पाहिजे.असा कालवा तयार होईल त्या वेळी त्यांच्या संगमाला नव्या महातीर्थाचं महात्म्य प्राप्त होईल.त्या सागरतीर्थाचं स्वप्न पाहात पुढं चला.दोन नद्यांचा संगम पवित्र मानला जातो.दोन महासागरांचा संगम त्याच्याहूनही अधिक पवित्र आहे. हा संगम हे एक स्वप्नरंजन मानू नका.

बैलगाडीचा शोध न लागलेल्या काळात जंगलातल्या माणसाला आपला कुणी वारसदार चंद्रावर जाऊ शकेल असे स्वप्नात तरी वाटले असेल काय? पण तुमच्या पिढीत स्वप्नात न येणाऱ्या गोष्टीही सत्य स्थितीत उतरल्या आहेत.म्हणून म्हणतो,चिरचिऱ्या नजरेनं मागं पाहू नका. भिरभिरणाऱ्या डोळ्यांनी आणि थरथरणाऱ्या अंतःकरणांनी क्षितिजावरलं या सागरतीर्थाचं स्वप्न पाहात पुढं चला.खऱ्याखुऱ्या मानवी समतेचं कमळ कुठं फुलायचं असेल तर ते या सागरतीर्थांच्या आसपासच फुलेल!"

समाप्त …








7/11/26

एका महामानवाचे एक भव्य स्वप्न ! A grand dream of a great man!

वि. स. खांडेकर

त्यावेळी गांधीजी नुकतेच आफ्रिकेतून मायदेशी परतले होते.आपले गुरू गोपाळ कृष्ण गोखले यांना भेटावे आणि त्यांच्या सल्ल्याने देशसेवेचा भावी कार्यक्रम निश्चित करावा असे त्यांनी ठरविले होते.पुण्याला गोखल्यांच्या भारत सेवक समाजात ते काही दिवस येऊन राहिले होते.त्यांचे अनवाणी चालणे,शेंगदाणे किंवा असलेच काही मोजके पदार्थ घेऊन भोजन करणे इत्यादी व्रतस्थ मनोवृत्ती दर्शविणाऱ्या गोष्टी कर्णोपकर्णी आम्हा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या कानांवर पडत होत्या.आश्चर्यमिश्रित आदराने आम्ही त्या ऐकत होतो. 'मासिक मनोरंजना'च्या त्यावेळच्या एका अंकात गांधी आणि कस्तुरबा यांचा फोटो प्रसिद्ध झाला होता.तो पाहून माझ्यासारख्या तारुण्याच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या विद्यार्थ्याच्या मनात उठलेले वादळ चित्रित करणे मोठे कठीण आहे.त्या फोटोतले गांधी एका बाजूने त्यांचे जग आमच्या जगापेक्षा भिन्न आहे,याची जाणीव होऊन ते फार दूरचे वाटू लागत.

स्वातंत्र्ययुद्धाची सूत्रे हलविणारा अर्धनग्न सेनापती

पण एक गोष्ट निश्चित होती.छायाचित्रांतल्या अत्यंत साध्या पोषाखातल्या गांधींच्या मूर्तीने अनेक तरुणांच्या अंतरीची एक अनामिक तार छेडली होती.आजच्या मानाने त्या काळी सुटाबुटातला मनुष्य बराच दुर्मीळ होता.सुटाबुटाभोवती परकीय राज्यकर्त्यांच्या प्रतिष्ठेचे एक झगझगीत वलय सदैव पसरलेले असे.हे सूटबूटमाहात्म्य एवढे मोठे असूनही बॅरिस्टर झालेला हा मध्यमवयीन मनुष्य इतका साधा पोषाख का करतो, नुसत्या साध्याच नव्हे तर जवळजवळ खेडवळ वाटेल अशा पेहरावात का वावरतो,हे कोडे त्यावेळी मी सोडविण्याचा प्रयत्न केला.पण मला ते सुटले नाही. मात्र काठेवाडी फेटा,बाराबंदीसारखा पायघोळ अंगरखा आणि जाडेभरडे टाचके धोतर अशा वेषातील गांधीजींची ती मूर्ती माझ्या मनावर कायमची कोरली गेली.

गांधीजींचा हा साधा वेषसुद्धा पुढे फार दिवस टिकला नाही.

लवकरच त्याचे रूपांतर खादीची पैरण,पांढरी टोपी आणि त्या सरंजामाला शोभेल असे धोतर या अतिसाध्या पोषाखात झाले.हाही अवतार अल्पकाळ टिकला आणि गांधीजी पुढे आमरण ज्या वेषात वावरले तोच छायाचित्रांनी आणि प्रतिमांनी जनमानसात अमर केला.डोक्यावर कसलेही शिरोभूषण नाही,गुडघ्याच्या खाली कसेबसे पोहोचेल असे पंचेवजा धोतर

आणि अंगावर एखादी चादर अथवा शाल याच वेषात भारतीय जनतेची अस्मिता जागृत करणारे नेते म्हणून आणि दोन तपांपेक्षा अधिक काळ स्वातंत्र्ययुद्धाची सूत्रे हलविणारे सेनापती म्हणून गांधीजी काम करीत राहिले.

गोलमेज परिषदेच्या वेळी गांधी इंग्लंडमध्ये गेले असताना बादशाहांनी त्यांच्या भेटीची इच्छा प्रदर्शित केली.राव-रंक सारेच गांधीजींचे मित्र.साहजिकच गांधींनी भेटीला जायचे मान्य केले.मात्र ज्याच्या साम्राज्यावर सूर्य कधीही मावळत नव्हता,अशा राजाच्या भेटीला जातानासुद्धा आपल्या वेषात सूतभरही फरक करण्याचे त्यांनी नाकारले.

इंग्लंडमध्ये राजदर्शनाकरिता विशिष्ट प्रकारचा साहेबी पोषाख करण्याचा शिष्टाचार आहे.तो गांधींना समजावून सांगण्यात आला.पण "राजेसाहेबांची व माझी भेट व्हायची असेल तर ती माझ्या नेहमीच्या पोषाखातच होईल." असे गांधीजींनी निक्षून सांगितले. जेय देशातील एका 'अर्धनग्न फकिराच्या' भेटीसाठी बकिंगहॅम पॅलेसमधील शिष्टाचारांना तात्पुरती रजा देण्यात आली!सर्वसामान्य भारतीय शेतकऱ्याच्या वेषाशीं साम्य पावणाऱ्या पोषाखातच गांधीजी दीर्घ काळ वावरले. 

हा वेष त्यांनी का स्वीकारला हे इतिहासाने स्पष्ट केले आहे.

गांधीजींच्या सर्व चळवळींचा,साऱ्या शिकवणुकीचा आणि प्रयोगशील जीवनाचा केंद्रबिंदू सामान्य मनुष्याचे पुनरुत्थान करून त्याची भौतिक आणि आत्मिक उंची वाढविण्याची पराकाष्ठा - हाच होता.ज्याचे नाव उभ्या जन्मात वृत्तपत्रात येण्याचा संभव नाही,पण जो आपल्या वाट्याला आलेले जीवन जिद्दीने जगण्याची धडपड करीत आहे असा अनामिक सामान्य मनुष्य हे गांधीजींचे दैवत होते.त्या माणसाविषयी त्यांच्या अंतःकरणात अपार भक्ती भरली होती.तथाकथित राजकीय मुत्सद्दी किंवा मोठमोठे पंडित यांच्यापेक्षा त्यांचे आंतरिक आणि स्नेहपूर्ण नाते होते ते या अज्ञात सामान्य माणसाशी!

आफ्रिकेत गांधीजी झगडले,सत्याग्रहाचे शस्त्र घेऊन लढले,ते याच सामान्य माणसावर होणारा अन्याय दूर व्हावा म्हणून! भारतांत अत्याचार या सामान्य माणसाच्या दुःस्थितीने व्यथित होऊनच त्यांनी त्याच्या उद्धाराचे कंकण हाती बांधले.चंपारण्यातला लढा, असहकारिता,खादीप्रचार,हरिजनसेवा,तिसऱ्या वर्गाचा प्रवास आणि भंगी वस्तीतला निवास या साऱ्या गोष्टी सामान्य माणसावरच्या त्यांच्या आत्यंतिकप्रेमाच्या निदर्शक होत्या.त्यांनी शेवटी स्वीकारलेला वेष हे त्यांच्या अंतरंगाच्या या उत्कट प्रेमाचे प्रतीक होते. 

'बुडती हे जन। पहावेना डोळा' असा सामान्य माणसाविषयीचा आपल्या अंतरीचा कळवळा तुकोबांनी व्यक्त केला आहे. सर्व संतांनीही आपल्या परीने ही अंतरीची व्यथा प्रकट केली आहे. सामान्य माणसाच्या दुःखाने त्यांची अंतःकरणे हेलावून जात असतील, हे काय कुणी कुणाला सांगायला हवे? पण संतांनी सामान्य मनुष्याची चिंता वाहिली ती मुख्यतः आध्यात्मिक दृष्टीने.विज्ञानविन्मुखतेच्या काळात वैराग्याचा वसा घेतलेल्या करुणावंतांना अन्य मार्ग सुचणे अशक्य होते

सामान्य मनुष्याच्या दररोजच्या हलाखीच्या जीवनात संतांनी सहसा लक्ष घातले नाही,किंबहुना ऐहिक जीवन हा,भारतातल्या काय किंवा अन्य देशांतल्या काय, साधुसंतांनी आपल्या चिंतनाचा प्रधान विषय कधीच मानला नाही.याला अपवाद असलेले रामदासांसारखे संत फार थोडे !

अन्याय,अज्ञान,अनीती व दारिद्र्य यांच्याविरुद्ध बंड

मात्र गांधीचे संतांशी एका बाजूने अगदी निकटचे नाते असले,तरी त्यांनी सामान्य मनुष्याच्या जीवनाचा जो विचार केला त्यात केवळ परलोकाला प्राधान्य नव्हते. माणसाला माणूस म्हणून या जगात जगविणे या ध्येयावरली त्यांची दृष्टी कधीच विचलित झाली नाही. गांधीजींच्या चिंतनात ऐहिक जीवनाच्या सर्व अंगोपांगांना स्थान होते.वैयक्तिक जीवनात यतिधर्मांचा पुरस्कार करणारे गांधीजी सामान्य मनुष्याच्या सर्व ऐहिक गरजांचा सूक्ष्म दृष्टीने विचार करीत असत.धर्मबुद्धी ही ईश्वर,अध्यात्म,परलोक इत्यादी गोष्टींशीच संबद्ध असलेली भावना नाही;सर्वसामान्य माणसाच्या दैनंदिन जीवनातही तिला स्थान आहे;आणि अन्याय, अज्ञान,अनीती व दारिद्र्य यांच्या विरुद्ध बंडाचा झेंडा उभारणे हे त्या धर्मबुद्धीचे परमपवित्र कर्तव्य आहे हे गांधींनी पंचविशीतिशीतच जाणले.

मानवी जीवन सुखी समृद्ध आणि सत्प्रवृत्त व्हावयाचे असेल तर दैनंदिन जीवनात धर्मबुद्धी सदैव जागरूक असली पाहिजे हे गांधींइतके सातत्याने आणि स्वच्छपणाने जगातील कोणत्याही राजकीय,सामाजिक वा आध्यात्मिक नेत्याने सांगितले नव्हते.

या नव्या धर्मबुद्धीची जाणीव गांधींच्या ठिकाणी किती प्रखर होती,याचे ते आफ्रिकेहून हिंदुस्थानात परत आले तेव्हाचे एक उदाहरण देण्याजोगे आहे - १९१६ च्या प्रारंभी बनारस हिंदू युनिव्हर्सिटीचा उद्घाटनसमारंभ होता.त्यात बोलण्याविषयी पंडित मालवीयांनी गांधींना निमंत्रण दिले.गांधींनी ते स्वीकारले.या समारंभाला बडेबडे संस्थानिक जुन्याकाळी स्वयंवराला जमत असत,त्याप्रमाणे नटून सजून आले होते! ता. ४ फेब्रुवारी १९१६ रोजी या समारंभात गांधी बोलले. या भाषणात त्यांनी अनेक ज्वलंत विचार प्रकट केले. "भाषा हे माणसाचे प्रतिबिंब आहे.

आपले विचार प्रकट करण्यास आपल्या भाषा जर असमर्थच असतील तर आपण जिवंत राहण्यापेक्षा मरून गेलेले बरे!" ही त्यातली एक ठिणगी! कागदी योजनेच्या बळावर आपण स्वराज्य मिळवू शकणार नाही,आपण स्वराज्याला पात्र ठरणार आहोत ते केवळ आपल्या कृतीच्या जोरावर.स्वराज्य मिळविण्याचा प्रयत्न करीत असताना आपण आपल्यातील दोष काढून टाकण्याचा प्रयत्न कसोशीने केला पाहिजे" - दुसरा स्फुल्लिंग! पण एवढ्यावरच ते थांबले नाहीत.ते पुढे म्हणाले, "काल या समारंभाच्या अध्यक्षांनी आपल्या भाषणात हिंदुस्थान देशाच्या दारिद्र्याचा उल्लेख केला. इतर अनेक वक्त्यांनी या मुद्यावर विशेष भर दिला.पण व्हॉईसरॉयांच्या हस्ते कोनशिलासमारंभ झाला त्यावेळी आपल्याला मंडपांत कोणते दृष्य दिसले? मला तर मंडपांत हिऱ्या-मोत्यांचे व जड जवाहिऱ्यांचे एक जंगी प्रदर्शन भरल्याचा भास होत होता.असले मौल्यवान दागिने घालून मिरविणाऱ्या संस्थानिकांना व सरदार दरकदाराना पाहून माझ्या मनात विचार आला की त्यांनी आपल्या अंगावरील हे दागिने देशबांधवांना देऊन टाकले नाहीत तोपर्यंत त्यांचे दारिद्र्य दूर होणार कसे? ब्रिटिश हिंदुस्थानात किंवा एखाद्या संस्थानात एखादा राजवाडा अथवा टोलेजंग इमारत उभारण्यात येणार असल्याची वार्ता माझ्या कानावर आल्याबरोबर माझ्या मनात पहिला विचार येतो स्वतः आपल्या शेतकऱ्याला लुबाडीत आहोत किंवा इतरांना लुबाडू देत आहोत तोपर्यंत तो हा की "अरेरे! हा सारा पैसा शेतकऱ्याकडून लुबाडण्यात आलेला आहे. आपण आपली स्वराज्याची तळमळ खरी आहे असे मुळीच म्हणता येणार नाही."

हरिजनांच्या दुःखाची समस्या

सामान्य मनुष्याविषयी गांधींना वाटणारे हे उत्कट ममत्व केवळ बौद्धिक,भावनिक अथवा व्यवहारिक स्वरूपाचे नव्हते.त्यात पुढारीपणाचा अभिनिवेश अथवा स्वप्नाळू करुणेचा लवलेश नव्हता.पुढारी होणाऱ्या मनुष्याला समाजाविषयी आपुलकी वाटते; मात्र, “ऐसी कळवळ्याची जाती। लाभाविण करी प्रीती।" या तुकारामांच्या कसोटीला तो सहसा उतरत नाही. ज्याच्या अंगी उपजत कळवळा नसतो, त्यालाही त्याचे शक्य तेवढे नवरसपूर्ण नाटक करावेच लागते. त्याशिवाय त्याचे सामाजिक स्थान स्थिर होत नाही आणि सुरक्षित राहत नाही.अशा विविध बुद्धिवान आणि कर्तृत्ववान लोकांपैकी एखाद्याने व्यक्त केलेला कळवळा अब्राहम लिंकन,मोहनदास गांधी किंवा मार्टिन ल्यूथर किंग यांच्याप्रमाणे अंतरंगातून उचंबळून आलेला स्त्रोत असत नाही.पंडिताने बुद्धिकौशल्याने सुलभ पद्यरचना करावी तसे पुढाऱ्यांचे बोलणे,चालणे आणि वागणे वाटते.हृदयाच्या हृदयातून निघालेल्या काव्याशी तुलना केली की ती पद्यरचना कृत्रिम,नाटकी आणि निर्जीव वाटू लागते.

या बाबतीत गांधीजी बड्याबड्या नेत्यांहून सर्वस्वी भिन्न होते.आपली मुले अर्धपोटीच झोपी गेलेली पाहून अंथरुणावर तळमळत पडणाऱ्या माउलीप्रमाणे भारतात सर्वत्र पसरलेल्या कोट्यवधी दलित,पीडित आणि वंचित जनतेविषयी त्यांचे मन अष्टौप्रहर चिंतन करी.त्यामुळे राजकीय स्वातंत्र्याची चळवळ अधिक समर्थ कशी करता येईल या एकाच विचाराने त्यांचे मन संपूर्णपणे कधीही व्यापून टाकले नाही.राजकीय आंदोलनांच्या धुमश्चक्रीतच आर्थिक आणि सामाजिक परिवर्तनाला पोषक अशा अनेक चळवळी त्यांनी सुरू केल्या. हरिजनसेवा ही त्यांतलीच एक फार महत्त्वाची प्रवृत्ती. राजकीय व्यासपीठावरून

पूर्वीच्या कुणाही पुढाऱ्याने हरिजनांच्या दुःखांचा आणि समस्यांचा इतक्या मूलग्राही पद्धतीने आणि अथांग आपुलकीने विचार केला नव्हता.पण शतकानुशतके अन्यायाला बळी पडलेल्या या दलित समाजाचा कैवार घेऊन गांधीजी पुढे सरसावले आणि कामाला लागले. सामान्य मनुष्याविषयी त्यांना वाटणारी ही आत्मीयता भारताच्या सामाजिक इतिहासात अपूर्व होती.

अपर्णादेवीच्या सिद्धार्थाची गोष्ट

बनारस हिंदू युनिव्हर्सिटीतल्या भाषणाप्रमाणेच त्यांची दुसरी एक आठवण सांगण्याजोगी आहे व चित्तरंजनदास यांच्या कन्या श्रीमती अपणदिवी यांनी डॉ. सुनीतीकुमार चटर्जी यांना सांगितलेली ही आठवण अशी आहे.

अपणदिवीचा पहिला मुलगा सिद्धार्थ.देशबंधुदास हे त्याचे आजोबा.त्यांनी आपल्या लाडक्या नातवाला नाना प्रकारच्या मौल्यवान अलंकारांनी नटविले होते.एकदा गांधीजी दासबाबूंना भेटावयाला त्यांच्या घरी आले. अपणदिवीनी आपल्या लाडक्या लेकाच्या अंगावर सारी बाळलेणी चढवली आणि गांधीजी व कस्तुरबा यांच्या आशीर्वादासाठी त्याला बाहेर आणले.गांधींनी सिद्धार्थाला वात्सल्याने उचलून घेतले.त्याच्याकडे पहात ते उद्‌गारले, "लहान मुलांच्या सौंदर्याबाबत कुणाला काही कळत नाही हेच खरे," एवढे बोलून त्यांनी सिद्धार्थाला जवळच्या पलंगावर ठेवले आणि त्यांच्या अंगावरून एक एक दागिना उतरविण्याला सुरुवात केली.हे पाहून आपली नापसंती दर्शवीत कस्तुरबा उदगारल्या, "हे काय चालविलंय तुम्ही? या गोड बाळाच्या अंगावरले दागिने काढून टाकणे किती निष्ठुरपणाचे आहे ! छे! त्याच्या अंगावरच राहू देत ते," गांधीजी हसत उतरले,"मी काय करतोय हे तुला समजलेलं दिसत नाही;जरा स्वस्थ बैस आणि नीट पहा."

शेवटी सिद्धार्थाच्या अंगावर एकही दागिना उरला नाही. मग त्याच्याकडे पाहत गांधीजी म्हणाले,"आता किती सुरेख दिसतो हा ! जणू काही एखादा राजपुत्रच!" मग अपणदिवीकडे वळून ते उद्गारले, "हे सारे दागिने या मुलाच्या नावाने देणगी म्हणून मी हरिजन कार्याकरिता स्वीकारीत आहे.अपर्णा,आता तुझी दागिन्याची पेटी आण पाहू." अपणदिर्वीच्या डोळ्यांत अश्रू उभे राहिले. पण त्या मुकाट्याने आत गेल्या आणि आपल्या दागिन्याच्या दोन पेट्या आणून त्यांनी गांधीजींच्या पुढे ठेवल्या.गांधीजींनी त्या पेटीतले सर्व दागिने पाहिले. त्यांतले काही मोठे नग निवडून,त्यांनी त्यांचे वजन आजमावले.मग ते दागिने आपल्यापाशी ठेवून ते म्हणाले, "अपर्णा,तू एका मोठ्या मनुष्याची मुलगी आहेस.हरिजनकार्याला मदत म्हणून तुझे हे दागिने मी घेत आहे.मला तुझं वचन हवंय.मी घेतलेल्या दागिन्यांच्या ऐवजी पुन्हा असले दागिने तू करवून घ्यायचे नाहीस.आहे

कबूल?" अपणदिवींनी तसे वचन दिले;ते दिल्यावर "आपल्या मनावरला एक फार मोठा अनामिक भार नाहीसा झाला,"असे अपणदिवींनी नमूद करून ठेवले आहे.

सामान्य माणसाची भौतिक प्रगती आणि आत्मिक जागृती

दलित,पीडित आणि वंचित मानवतेबद्दल वाटणारे उत्कट ममत्व हा गांधीजींच्या आत्म्याचा स्थायिभाव होता.त्यामुळे आफ्रिकेत काय किंवा भारतात काय, त्यांनी ज्या ज्या चळवळी आणि उपक्रम केले त्यांचे त्यांचे मध्यवर्ती सूत्र एकच होते.उपेक्षित आणि वंचित सामान्य मनुष्याचा उद्धार !

भारतीय स्वातंत्र्यांच्या चळवळीचे दोन तपांहून अधिक काळ त्यांनी नेतृत्व केले;पण राजकीय स्वातंत्र्य हे त्यांच्या दष्टीने अंतिम साध्य नव्हते;या देशातल्या सामान्य मनुष्याचा सामाजिक,आर्थिक आणि सांस्कृतिक पुनर्जन्म घडवून आणण्याचे ते एक समर्थ साधन होते.मात्र हे सर्वस्पर्शी परिवर्तन केवळ बाह्य बदलांनी होणार नाही,सामान्य माणसाची सुप्त आंतरिक शक्ती जागृत व वृद्धिंगत करून तिच्या सहाय्याने हे परिवर्तन घडवून आणले पाहिजे,याचा त्यांना कधीच विसर पडला नाही.सर्व प्रकारच्या आत्यंतिक विषमतेमुळे सत्ताधाऱ्यांच्या,उच्चवर्णीयांच्या आणि धनसंपन्नांच्या पायदळी तुडवला जाणारा मनुष्य तसाच राहू नये म्हणून त्यांनी या सर्वांची पावले जशी रोखून धरली,तशी धुळीत पडलेल्या दुर्बल दलितांना स्वतःच्या हातांनी उठवून त्यांच्या अंगावरील धूळ त्यांनी झटकून टाकली;ताठ मानेने इतरांच्यापुढे उभे राहण्याची त्यांना दीक्षा दिली.भारतीय समाजातल्या अगदी तळाच्या मनुष्यालाही निर्भय,स्वावलंबी आणि जीवनसन्मुख करण्याचे जेवढे निकराचे प्रयत्न गांधींनी केले,तेवढे अन्य कोणीही केले असतील असे वाटत नाही.सामान्य माणसाच्या आत्मबलावर साचलेला राखेचा थर दूर व्हावा,त्या राखेखाली विझत चाललेला स्फुल्लिंग मुक्तपणे चमकावा,त्या ठिणगीला ज्ञानाचे आणि चिंतनाचे वारे लागावे आणि हळूहळू फुलून तिच्यातून खरीखुरी माणुसकी असलेला आणि हक्क व कर्तव्य यांची सारख्याच भक्तिभावाने उपासना करणारा नवमानव निर्माण व्हावा ही गांधीजींची अंतरीची तळमळ होती.केवळ भौतिक समृद्धी माणसास समाधानी ठेवू शकणार नाही हे त्यांनी ओळखले होते. म्हणून एका बाजूने सामान्य मनुष्याच्या भौतिक प्रगतीसाठी आणि दुसऱ्या बाजूने त्याच्या आत्मिक जागृतीसाठी गांधीजी सतत धडपडत राहिले.

एका महामानवाचे ते भव्य स्वप्न होते !

ही धडपड पिढ्यान् पिढ्या चालू राहणे आवश्यक होते. कारण हा काही केवळ क्रांतीने आणि कायद्यांनी नवा समाज घडविण्याचा प्रयत्न नव्हता.दानव बदलू शकतो, त्याच्यातले पशुत्व पुन्हा वर डोके काढणार नाही,असे परिवर्तन त्यांच्यात होऊ शकते,दुर्दम्य श्रद्धेने प्रेरित झालेल्या एका महामानवाचे ते भव्य स्वप्न होते. 

असल्या स्वप्नांच्या साक्षात्काराने झपाटलेली माणसे इतिहासाला अज्ञात नाहीत.आपले स्वप्न सत्यसृष्टीत उतरावे म्हणून ही जगावेगळी माणसे जीवाचे रान करतात.गांधीजींनीही आयुष्यभर तेच केले पण आजच्या सर्वसामान्य मनुष्याकडे आपण पाहू लागलो तर गांधीजींनी वर्षानुवर्षे उराशी बाळगलेल्या स्वप्नांचा चक्काचूर झालेला दिसतो! गांधीजींच्या स्वप्नातला तो माणूस आज भारतातून अदृश्य झाला आहे!

आचार्य दादा धर्माधिकारी यांनी काही दिवसांपूर्वी एका व्याख्यानात 'गांधीजी ज्याचे राष्ट्रपिता होते ते राष्ट्र आज कोठे आहे?" असा परखड प्रश्न विचारला होता. जीवनाच्या सर्वच क्षेत्रांत या दुःखद प्रश्नाचे प्रतिध्वनी पावलोपावली ऐकू येत आहेत.ब्रिटिश सिंहाच्या गर्जनेला भीक न घालणारा भारतीय सामान्य मनुष्य आज नाना प्रकारच्या जुन्या नव्या गंडांनी ग्रासला गेला आहे.त्याला जशी मध्यान्ह काळाची चिंता भेडसावते,तशी आपल्या कच्च्याबच्यांच्या भवितव्याची काळजीही बेचैन करते.पारतंत्र्याच्या काळात ताठ मानेने तुरुंगात पाऊल टाकायला शिकलेला हा माणूस आज स्वराज्यात हुजरेगिरी आणि मुजरेगिरी,भ्रष्टाचार आणि काळाबाजार यांच्याशिवाय आपल्या स्थैर्याला दुसरा आधार नाही असे मानण्याइतका भ्रांतचित्त झाला आहे. टिळक-गांधीजींच्या काळात त्याच्या मनात लुकलुकणारी देशभक्ती आज विझून गेली आहे.त्याग आणि सेवा हे स्वातंत्र्यलढ्याच्या काळात देव्हाऱ्यातले देव होते;पण आज त्यांची किंमत दगडापेक्षा अधिक राहिलेली नाही!

चार तपांपूर्वी दरमहा हजारो रुपये कमावणाऱ्या बॅ.चित्तरंजन दासांसारख्या कायदेपंडितांनी गांधीजींनी कोर्टावर बहिष्कार घालण्याचा आदेश देताच आपली वकिली सोडून दिली.ही गोष्ट आजच्या विशी-पंचविशीतल्या तरुणांना स्वप्नातले राज्यदानाचे वचन खरे करणाऱ्या हरिश्चंद्राच्या कथेइतकीच पौराणिक वाटली तर त्यात नवल कसले ?

१९२० ते १९४७ हा गांधीजींच्या भारतातील कर्तृत्वाचा कालखंड,त्याची समाप्ती स्वराज्यप्राप्तीने झाली.पण या कालखंडात गांधीजींनी सामान्य मनुष्याच्या ठिकाणी जे चैतन्य निर्माण केले होते,जी सामाजिक धर्मबुद्धी जागृत केली होती,तिची स्थिती गेल्या वीस वर्षांत विझत चाललेल्या यज्ञकुंडाप्रमाणे झाली आहे.या कुंडातली राख अजून थोडी ऊन आहे,अधूनमधून ती अंगारा म्हणून लोकांना देता येते,एवढ्यावर बडी बडी माणसे संतुष्ट आहेत!

गांधी नावाचे महात्मा,संपादक रॉय किणुकर,साहाय्यक- अनिल किणीकर,डायमंड पब्लिकेशन्स..

ते चैतन्य आज अस्तित्वात आहे काय ?

शालिवाहनाने मातीच्या बाहुल्यातून लढवय्ये सैनिक निर्माण केल्याची लोककथा आहे.तिचा साक्षात्कार १९२० नंतरच्या काळात भारताला झाला.पोलिसाला घाबरणारी माणसे निधड्या छातीने.

उर्वरित भाग पुढील लेखामध्ये…!!