व्हेन आय फेल फ्रॉम द स्काय' हे पुस्तक ज्युलियन कोपेक डिलर यांनी लिहिलं ते २०११ साली.म्हणजे अपघातानंतर तब्बल ४० वर्षांनी.हे पुस्तक केवळ त्यांच्या जंगलातल्या ११ दिवसांच्या अनुभवांचंच नव्हे,तर त्या काळात त्यांच्या मनात घडलेल्या खळबळींची आणि या घटनेनंतरच्या त्यांच्या आयुष्याचीही कहाणी सांगतं.
तिथल्या पक्ष्या प्राण्यांच्या अभ्यासासाठी आपण आयुष्यभर काम करायला हवं.तोच आपल्या आयुष्याचा अर्थ असू शकतो याची जाणीव तिला या प्रवासात होते. ज्युलियनचा हा प्रवास जसा मृत्यूकडून जीवनाकडे चाललेला असतो तसाच तो जगण्याचा अर्थ शोधण्याच्या दिशेनेही सुरू होतो हे विशेष.
जिथे तू अडकली होतीस त्या जंगलाचं पुन्हा तोंडही पाहू नये असं वाटणं साहजिक नाही का,असा प्रश्न पुढे ज्युलियनला अनेकदा विचारला गेला.तिला अर्थातच तसं कधीही वाटत नाही.उलट,अशा खडतर जीवन-मरणाच्या प्रसंगी माणसांच्या प्रतिक्रिया आपण मानतो तशा एका साच्यातल्याच नसतात,हेच ज्युलियनची गोष्ट आपल्याला सांगते.
एकीकडे ज्युलियनच्या मनात स्वतःच्या हिमतीवर बाहेर पडण्याची इच्छा कायम असली तरी तिची शक्ती मात्र कमी कमी होऊ लागलेली असते.त्यातच आणखी एक समस्या डोकं वर काढते.
तिच्या खांद्याजवळ एक जखम झालेली असते.
अधूनमधून मान मागे वळवून ती जखम तपासण्याचा चाळा ज्युलियनला लागलेला असतो. एकदा तिच्या लक्षात येतं की त्या जखमेत अळ्या वळवळताहेत.
बहुतेक एक प्रकारच्या माश्यांनी त्या जखमेत अंडी घातलेली असतात आणि त्यातून अळ्या बाहेर आलेल्या असतात.ती जखम डोळ्यांसमोर नसल्यामुळे त्या अळ्या काढणं ज्युलियनसाठी अतिशय अवघड असतं.मान तिरकी करून एका काटकीचा चिमटा तयार करून ती त्या अळ्या काढण्याचा प्रयत्न करते;पण काटकीचा स्पर्श झाल्यावर त्या पुन्हा जखमेच्या आत गायब होतात.
ज्युलियनच्या घरच्या कुत्र्याच्या जखमेतही अशाच अळ्या झाल्याचं तिला आठवतं.तेव्हा त्याच्या जखमेवर केरोसीन टाकून त्या बाहेर काढलेल्या असतात.पण इथे तिच्याकडे ना केरोसीन असतं ना आणखी कुठलं औषघ.त्यामुळे वेळ मिळेल तेव्हा काटकीने डिवचून त्या एकेक करून बाहेर काढण्याशिवाय पर्याय नसतो.सध्या तरी त्या अळ्यांमुळे काही त्रास नसला,तरी आपल्या शरीरात अळ्या वळवळताहेत ही जाणीव फारशी चांगली नसते.या अळ्या आपलं शरीर आतून पोखरून काढताहेत,अशी दृश्यं ज्युलियनला आपल्या डोळ्यांसमोर दिसू लागतात.
आता नदीचा प्रवाह आणखी मोठा झालेला असतो आणि तो वाहता असल्यामुळे त्यात पोहत पोहत पुढे जाता येऊ शकेल असा शोध ज्युलियनला लागतो. त्यामुळे तिच्या प्रवासाचा वेग वाढतो आणि शक्तीही कमी खर्च होते.नदीत मध्ये मध्ये मोठाले ओंडके पडलेले असतात.त्यांच्यावर न आदळता पुढे जाण्याची कसरत तिला करावी लागते एवढंच.या टप्प्यात तिला नदीकिनारी अनेक प्राणीही दिसतात,पण त्यांची भीती वाटावी असं त्यात कुणीही नसतं.एकदा मात्र ज्युलियन संकटात सापडता सापडता बचावते.थोडा काळ नदीच्या काठी विश्रांती घेत असताना तिला एक ओळखीचा आवाज ऐकू येतो. छोट्या मगरीच्या पिल्लांचा तो आवाज असतो.ती पिल्लं नदीतून बाहेर येत अगदी तिच्या जवळ येऊन ठेपलेली असतात.पाहते तर त्यांची आईही नदीतून बाहेर पडण्याच्या बेतात असते.पिलांच्या सुरक्षेपोटी ती आपल्यावर जीवघेणा हल्ला करू शकते हे ज्युलियनला माहिती असतं.पण इथेही जंगलाबद्दलचं तिचं ज्ञान आणि अनुभव उपयोगी पडतो.
काठावर येणारी मगर दिसली की कुणीही तिच्यापासून दूर जंगलात पळून जाण्याचा विचार करणार.पण जंगलात घुसलं तर इतर प्राण्यांची भीती तर आहेच,
शिवाय वाट चुकण्याचा धोकाही मोठा आहे,हे ज्युलियनला माहिती असतं. त्यापेक्षा ती स्वतःच्या अनुभवावर विसंबून थेट पाण्यात शिरते आणि मगरीशेजारून पोहत पुढे पुढे जाते. आपण आपल्या मार्गाने गेलं तर मगर आपल्या वाटेला जाणार नाही,हा तिचा होरा बरोबर ठरतो आणि एक धोका टळतो.
आता पोहणं आणि चालणं ज्युलियनसाठी आणखी अवघड होऊ लागलेलं असतं.नजर आणखी धूसर होऊ लागते.आता आणखी तग धरायचा असेल तर काही तरी खायला हवं हे तिला कळत असतं.पण काय खाणार? पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे सगळीकडे बेडूक ओरडत असतात.ते पकडून खावेत,असा विचार तिच्या मनात येतो.किळस बाजूला ठेवून ती बेडूक पकडण्याचा प्रयत्नही करते;पण काही केल्या तिला ते जमत नाही.शक्ती आणि चपळता दोन्ही कमी झालेली असल्यामुळे अगदी हातात येऊनही बेडूक तिच्या तावडीतून सुटतात.
दहावा दिवस उजाडतो.आता थोडा काळ विश्रांती घेतल्याशिवाय पुढचा प्रवास शक्य नाही,असं वाटून ती एका ठिकाणी किनाऱ्याशी थांबते.थोडं चालल्यावर तिला समोर एक बोट उभी दिसते.अगदी नवी कोरी करकरीत बोट. आपल्याला नक्कीच भास होतोय याची जणू ज्युलियनला खात्रीच असते;पण तरीही शंका नको म्हणून जवळ जाऊन हात लावून बघते,तर बोट खरीच असते.
किनाऱ्याकडे लक्ष जातं,तर तिथे एक छोटा तंबू उभारलेला तिला दिसतो.ती एका ओढीने त्या तंबूकडे जायला लागते;पण तिच्या अंगात त्राण इतके कमी असतात की शंभर फूट चालायला तिला काही तास लागतात.त्या तंबूत कुणी तरी माणूस असेल अशी तिला आशा असते;पण तिथे कुणीच नसतं.कुणी येऊन गेलंय अशी चिन्हंही नसतात.पण त्या तंबूमुळे ज्युलियनला किमान एक आसरा मिळतो.शिवाय तिथे तिला केरोसीनची बाटली मिळते.ती पाहिल्यावर तिला खांद्याजवळच्या जखमेत झालेल्या अळ्या आठवतात.
महत्प्रयासाने बाटलीचं बूच उघडून ती थोडं थोडं केरोसीन जखमेवर टाकते.प्रचंड वेदना होतात आणि पहिल्यांदा अळ्या आणखी आत जाण्याचा प्रयत्न करतात,पण नंतर मात्र त्या झपाट्याने बाहेर येऊ लागतात.ज्युलियन अशा ३० अळ्या मोजते.सगळ्या बाहेर आलेल्या नसल्या तरी तेवढ्या कामगिरीमुळेही ती स्वतःवर खूप होते.ज्युलियन इतकी थकलेली असते की तिथे मेल्यासारखी झोपून राहते.इतकी चांगली झोप फाइव्ह स्टार हॉटेलमध्येही लागणार नाही असं तिच्या मनात येतं.
आता पुढे चालत राहावं की थांबून या तंबूचा मालक येईल याची वाट पाहावी हे ज्युलियनला कळत नाही. नदीच्या काठाशी लागलेली बोट घेऊन पुढे जावं असा मोहही तिला एकदा होतो;पण स्वतःची सुटका करून घेण्यासाठी दुसऱ्या माणसाचा जीव धोक्यात घालणं तिला पटत नाही.शिवाय या अशक्त अवस्थेत ती बोट चालवू शकेल का याबाबतही शंका असतेच.त्यामुळे आणखी थोडी विश्रांती घेऊन चालणं पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेते.
बाहेर पाऊस पडत असतो आणि आत ज्युलियन अर्धवट जागी अर्धवट ग्लानीत पडून असते.डोक्यात नाना विचारांचा गोंधळ उडालेला असतो.तिच्या मनात येतं,अपघाताला दहा दिवस नक्कीच उलटून गेले आहेत.आतापर्यंत नक्कीच सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढलं गेलं असणार.
फक्त आपणच या जंगलात एकटे भरकटतोय.आपली सुटका होण्याआधीच आपण मरून गेलो तर आपला शेवट कुठे झाला हे जगात कुणालाही कळणार नाही.दहा दिवस आपण कोणत्या परिस्थितीतून गेलो,किती धीराने-किती कष्ट घेऊन चालत राहिलो हे जगात कधीच कुणाला कळणार नाही,ही भावना तिला व्यापून टाकते.कालपर्यंत आपल्या गोतावळ्यात असणारा माणूस असा अचानक कसा नाहीसा होऊ शकतो,या नियतीच्या खेळाचं तिला प्रचंड कोडं वाटत राहतं.या परिस्थितीचं नवल करत ती पडून राहते.... आणि तितक्यात बाहेरून माणसांचे आवाज ऐकू येतात.आधी ज्युलियनला हाही भासच वाटतो.पण हळूहळू ते आवाज जवळ येतात,तिच्या समोर येऊन उभे ठाकतात.त्यांच्या चेहऱ्यावर आश्चर्य, धक्का आणि भीतीचं मिश्रण असतं.त्यांनी काही विचारण्याआधीच ज्युलियन बोलू लागते,"मी लान्सा क्रॅशमधून वाचलेली मुलगी आहे.माझं नाव ज्युलियन, मी गेल्या दहा दिवसांपासून चालते आहे.आणि आता मरणाची दमले आहे."तिचं बोलणं ऐकल्यावर त्या माणसांचे चेहरे बदलतात.ते भराभर तिला हवं-नको ते बघायला लागतात.
आपल्याकडचं खाणं काढून तिला देतात.खरं तर त्या दिवशी या तंबूकडे येण्याचा त्यांचा अजिबात विचार नसतो;पण सहज म्हणून ते तिथे येतात आणि त्यांना ज्युलियन सापडते.
ज्युलियन सुखरूप हॉस्पिटलमध्ये जाऊन पोहोचते. वडिलांना भेटते.पण लिन्साच्या अपघातात वाचलेले आपण एकमेव प्रवासी आहोत आणि आपल्या आईसह इतर सर्व प्रवासी मृत्युमुखी पडल्याचं तिला कळतं.
आपण वाचल्याचा आनंद घ्यावा की आईच्या मृत्यूचं दुःख करावं अशा नव्या पेचात ती सापडते.हीच द्विधा अवस्था तिचे वडीलही अनुभवत असतात.मुलगी सापडली याचा आनंद तर असतोच;पण त्यांचं आपल्या पत्नीवर इतकं प्रेम असतं की त्या धक्क्यातून ते कधीच सावरू शकत नाहीत.त्यामुळे जंगलातल्या संकटातून वाचली असली तरी नव्या परिस्थितीत नव्या समीकरणांसह आयुष्याची घडी बसवण्याच्या नव्या आव्हानाला तिला सामोरं जावं लागतं.
ज्युलियन सुखरूप बचावल्याची बातमी जगभर पोहोचल्यावर आणि नंतरही ती किती धाडसी आणि असामान्य आहे असा कौतुकवर्षाव तिच्यावर झाला-अजूनही होत असतो.पण ज्युलियन म्हणते,'मी असामान्य अजिबातच नव्हते.आजही नाही.आई-वडिलांनी मला जंगलाच्या सान्निध्यात वाढवलं म्हणून मी तिथे तरू शकले;पण माझ्या जागी आणखी कोणी असतं तरी त्यांनीही तेवढंच धाडस दाखवलं असतं.असामान्य परिस्थिती आपल्याला त्या त्या वेळी असामान्य बनवते,हे त्यामागचं खरं कारण असलं पाहिजे.
माझ्या लाडक्या सर्व वाचकांचे आभार व धन्यवाद.मृत्यू पाहिलेली माणसं,मृत्यूच्या दारातून परतलेल्या व्यक्तींच्या थरारक कहाण्या,संकटांच्या वावटळीत तग धरून राहणाऱ्या सामान्यांमधल्या असामान्यांना,गौरी कानेटकर,समकालीन प्रकाशन,आतापर्यंत आपण नऊ कहाण्या वाचल्या.ह्या कहाण्या व या पुस्तकाचा प्रवास या ठिकाणी संपलेला आहे.पण आपल्या सोबतचा हा वाचण प्रवास निरंतर सुरुच राहील.
… समाप्त