नारायणा,अरे,पाट घेऊन बसायचंस,जमिनीवर काय बसलास ?" ह्या माईंच्या सूचनेवर "माईसाहेब,जमीन नुक्तीच गाईच्या शेणाने सारवलेली दिसती आहे.त्या शेणाची ऊब अजूनही आहे." ह्या नारायणमामाच्या उत्तरावर सगळेच हसले.त्यातही बच्चे कंपनी जास्तच.आज मंदा,मुक्ता गप्पांचा मनसोक्त आनंद घेत होत्या. कारण यशाने त्यांना तिथे बसायची परवानगी दिली होती त्यामुळे ना आता मंदाला सतत यशाच्या नजरेचा धाक होता ना मुक्ताला नजर चोरण्याची गरज.
तासभर गप्पा झाल्यावर माई म्हणाल्या,"अरे,तुम्ही रात्रभराचा प्रवास करून आला आहात.नारायण,तू आणि मुलं मागे आडावर जाऊन दात घासा आणि आंघोळी करा.बंब चांगला रसरसतोय,मी नुक्तीच पाहून आलेय.यशा विसणाला आडाचं पाणी शेंदून देईल.शकू इथेच स्वैपाकघरातल्या मोरीत करील आंघोळ."
नाही तरी मुलांना मागच्या अंगणात बांधलेल्या लक्ष्मी-पार्वती बघायच्याच होत्या.त्यामुळे माईआत्यांची सूचना ऐकल्यावर सगळे मागच्या अंगणाकडे धावायला लागले.मामींनी त्यांना थांबवून टॉवेल,ब्रश आणि टूथपेस्ट घ्यायची आठवण केल्यावर सगळे थांबले.बॅगा उघडायला लागले.त्यांच्या बरोबरीने यशा-मंदा-मुक्ता मागेपुढे करत होते.आत्तापर्यंत पाव्हणे आल्याच्या आनंदात त्यांचं सामानाकडे लक्षच नव्हतं.पण आता त्यांचं लक्ष मामांनी आणलेल्या बॅगांकडे गेलं.
उन्हाळ्याच्या सुट्टीत आड आटला,गावात पाण्याचा टँकर सुरू झाला की,त्यांचा मुक्काम ठाण्याला अशोकभाऊकडे हले.त्यावेळी त्यांचं अवाढव्य सामान काळ्या रंगाच्या,वरून रिबिट मारलेल्या अवजड लोखंडी पेट्यांत असे.त्या पेट्यांमध्ये काय काय असे ? तर - भाजणी असे,सातूचं पीठ असे,कपडेही असत. बापूंच्या बैठकीच्या सतरंजीत हे सगळं शंकर न्हावी आणि बाबू तांगेवाला ह्यांच्या मदतीने घट्ट बांधून त्याची वळकटी केलेली असे.
नारायणमामाचं सामान कसं आटोपशीर होतं.शिवाय ते रंगीत बॅगांमध्ये भरलेलं होतं. त्या बॅगा रबरी होत्या की प्लॅस्टिकच्या कोण जाणे! आणखी विशेष म्हणजे त्यांना अंगचीच कुलपं होती. सगळंच नवल! येताना ते सगळे रिझर्व्हेशन करून आले होते म्हणे.म्हणजे एकदा का तुम्ही रिझर्व्हेशन केलं की, तुमच्या जागेवर कुणीच बसत नाही.रेशनच्या रांगेत आपला दगड ठेवून जागा अडवतात तसं.सगळं अजबच की!
उन्हाळ्याच्या सुट्टीत ठाण्याला जाताना मोठी सर्कसच असे.डायरेक्ट ठाण्याला गाडी नसायची.त्यामुळे पहिल्यांदा मनमाडला जाऊन तिथून ठाण्याची गाडी पकडावी लागे.
मनमाडपर्यंत शंकर पोहचवायला यायचा. हमाल दरवाजातून सामान आत नेई.बापू आणि शंकर हे दोघे यशा-मंदा-मुक्ताला खिडकीतून आत ढकलत नि आतले प्रवासी त्यांना बाहेर ढकलत.मधल्यामध्ये मुलांचं चांगलंच मर्दन होई.
मामांचं हे आटोपशीर सामान मुलं नवलाईने पाहत होती.मामांच्या मुलांनी बॅगांमधून आपली टूथपेस्ट,
ब्रश, टर्किश टॉवेल बाहेर काढले.साबणाची वडी बाहेर पडताच सगळी खोली सुगंधित झाली.ह्या सगळ्या गोष्टी जवळून पहिल्यांदाच पाहत असल्याने यशा आणि मुक्ता हजार प्रश्न विचारत होते.त्यात नवल आणि कौतुक होतं पण असूया किंवा लोभ नव्हता.मुक्ताने तर हळूच टर्किश टॉवेल वरून हात फिरवून पाहिला आणि यशाने साबणाचा वास नाकात भरून घेतला.
आंघोळीच्या वेळी माधुरीने ही गंमत आपल्या वडिलांना सांगितली.तेव्हा त्यांना जरा अवघडल्यासारखं झालं.
नारायणमामांनी यशाला विचारलं,"यशा,आवडला का रे तुम्हाला हा टॉवेल ?पुढच्या वेळी येताना तुम्हा तिघांसाठी असे तीन टर्किश टॉवेल घेऊन येईन आणि तिघांसाठी टूथपेस्ट नि ब्रशसुद्धा."
धाकट्या बहिणी काही बोलायच्या आतच यशा म्हणाला,"मामा, इथे गावात पाणी खूपच कमी असतं. एवढे मोठाले टॉवेल धुवायला पाणीपण खूप लागेल ना. त्यामुळे आम्ही वापरतो ते पंचे सोयीचे आहेत.आमच्या गुरुजींनी आम्हाला कोळशाच्या राखंडीत कापूर अन् तुरटी घालून त्याच दतमंजन करायला शिकवलं आहे. बोटाने दात घासले की,मागूनपुढून दात स्वच्छ होतात असं गुरुजी म्हणतात.तुम्हाला जाताना डबीभर देऊ का मी तयार केलेलं मंजन ? आवडेल तुम्हाला."मामाला आपल्या भाच्याच्या बोलण्याचं कौतुक वाटलं.अजितने विचारलं, "यशादादा, इकडे थंडी खूप आहे ना? गाल-ओठ फुटल्यावर
तुम्ही काय लावता ?"
मुक्ता पटकन म्हणाली, "अरे,आमच्याकडे कोकमाचे खडे किंवा तेल मिळतं.तेच आम्ही हातापायांना लावतो."
"कोकमामुळे अंग फुटत नाही आणि नरमपण राहतं." मंदाने पुष्टी जोडली
संध्याकाळी यशा,मंदा,मुक्ता ह्यांचं पाहुण्यांना घेऊन गावाबाहेरच्या तळ्यावर फिरायला जायचं ठरलं.गावात पाण्याचा दुष्काळ असल्याने गावच्या नगरशेटनी खूप वर्षांपूर्वी गावाच्या सोयीसाठी हे तळं बांधलं होतं.त्या तळ्याचा गावाला उपयोगदेखील होत असे.मे महिन्यात तळं कोरडंठाक पडेपर्यंत घरोघरीच्या विहिरींना-आडांना पाणी असे.दूरदृष्टी ठेवून शेटजींच्या कुटुंबीयांनी तळ्याच्या सभोवती चिंच,कडुलिंब,पिंपळ अशी झाडं लावली होती.अर्थात जंगली झुडपं अन् बाभळीचीही झाडं त्या परिसरात खूप होती.
गावच्या प्रेक्षणीय स्थळांपैकी गावाबाहेरचं हे तळं एक होतं.
घरून निघाल्यापासून गप्पांना नुसता ऊत आलेला होता.अजित यशाला क्रिकेटच्या आणि त्याच्या शाळेच्या गमती सांगत होता.मंदा आणि मुक्ता माधुरीशी हितगुज करत होत्या.मोन्या कधी ह्यांच्यात तर कधी त्यांच्यात शिरण्याचा प्रयत्न करत होता.मामा आणि मामी सगळ्यांच्या मागून गप्पा मारत रमतगमत येत होते. मोकळी जागा बघून सगळे बसले.अजित आणि यशा तळ्यात चपटे दगड फेकून गोल चाकोऱ्या काढायला लागले.
'आजूबाजूला बाभळीचे मोठमोठे काटे आहेत रे...' मामांनी सगळ्यांना सावध केलं.गावातला प्रसिद्ध भेळभत्ता बरोबर आणला होता.तो खाऊन झाल्यावर पुड्याचा कागद बघून मामांना त्यांचं बालपण आठवलं."शकू,आम्ही लहानपणी कशी भिरभिरं बनवायचो,ते दाखवतो हं!"मामांनी तो भेळीचा कागद,बाभळीचा काटा आणि तिथेच पडलेली बकरीची लेंडी घेऊन बघता बघता एक भन्नाट भिरभिरं बनवलं अन् मोन्याला खेळायला दिलं.
"अजित,आमच्या लहानपणी तुमच्यासारखे क्रिकेट वगैरे खर्चिक खेळ नव्हते.
सगळे खेळ बिनखर्चाचे !"
घरी येता येता मामा यशाला म्हणाले,"यशवंतराव,उद्या सकाळी आपण सगळेच कोटमगावला देवीच्या दर्शनाला जाऊ.माई-बापूंनापण घेऊन जाऊ.सकाळी नऊच्या सुमारास येतील असे दोन तांगे तुम्ही आजच सांगून ठेवा.आणि हो,सकाळी लवकर उठून बेकरीतून पावपण घेऊन या म्हणजे माईला एवढ्या सगळ्यांचा नास्ता करण्यात वेळ घालवायला नको.तांगा सांगायला जाशील तेव्हा बाबूला उद्या रात्रीच्या पुण्याच्या गाडीला आम्हाला सोडायलाही सांग."
"म्हणजे काय,तुम्ही लगेच जाणार?" यशा-मंदा-मुक्ताने चकित होऊन एकसाथ विचारलं,"काय करणार बाबा! पापी पेट का सवाल है.उद्या गेलो नाही तर मला नोकरीवरून काढून टाकतील.मग इथे तुमच्या गावात येऊन मला भिरभिरी बनवून विकावी लागतील."
मामांच्या ह्या बोलण्यावर सारेच हसू लागले.
अण्णांच्या बेकरीतून पाव आणणं हा यशा आणि त्याच्या दोन्ही बहिणींसाठी सटीसहामासी येणारा योग होता.घरचं धान्य होतं.गाईचं दूध-तूप होतं.त्यामुळे खाण्या-पिण्याची ददात नव्हती.पण रोख पैसा खर्च करून काही खायचं आणणं त्याकाळी परवडत नव्हतं आणि तशी पद्धतही नव्हती.बापूंच्या तुटपुंज्या पेन्शनमध्ये वरखर्च करताना महिन्याच्या शेवटी खर्चाची दोन्ही टोकं मिळवणं नेहमीच अडचणीचं असे.
माई त्यांना म्हणे,"सकाळी सकाळी हे बाहेरचे पाव आणून खाण्यापेक्षा मी तुम्हाला छानसे गरम गरम गाकर करून देते.दोन दोन हारोळ्या खाल्ल्या की,पोटातपण कसं दमदमीत असतं.नाही तर बाजरीची भाकरी आणि दूध आहेच."अण्णांच्या बेकरीतून उद्या पाव आणायचा हे आदल्या दिवशीच बापू मुलांना सांगत.मुलंही सकाळ कधी होते ह्याची वाट पाहत झोपत.झुंजूमुंजू झाल्यावर यशा आणि मंदा-मुक्ता पैकी जी कुणी जागी असेल ती थंडीचीच घरातून निघत.गल्लीतली कुत्री मागे लागत पण त्यांना दगड मारत,हाडहुड करत अण्णांच्या बेकरीपर्यंत पोहचत.बहुदा अजून अण्णांची बेकरी उघडलेली नसे.दुकानाबाहेरच्या थंडगार फरशीवर कोपऱ्यात ही भावंडं एकमेकांना चिकटून बसत.थंडीचा कडाका असला तरी दुकान उघडेस्तोवर तिथेच बसत. घरी जात नसत.न जाणो घरी जाऊन परत येऊ म्हटलं आणि बापूंनी बेत बदलला तर ! तर काय करायचं ?
बेकरीवाल्या अण्णांचं खरं नाव काय होतं कुणास ठाऊक. पण ते सगळ्यांना 'अण्णा' म्हणत म्हणून गावाने त्यांचंच नाव 'अण्णा' ठेवलं होतं.धुक्यात लांबून तपकिरी टोपी आणि पिवळसर कोट घातलेली आकृती दिसली की,मुलं खूश होत.यशाला पाहून अण्णा म्हणत, "यशाअण्णा,तुम्ही ताईसाहेबांना घेऊन थंडीचं असं बसलेलं पाहून माझ्या पोटात तुटत.आज सकाळी येणार हे कालच सांगितलं असतं तर लवकर आलो असतो. नाही तरी रात्रभर जागाच असतो."
मुलांना वाट बघायला लागली म्हणून अण्णा त्यांना पावांच्या बरोबर एकेक नानखटाईपण देत.अण्णांचं गावातल्या मुलांवर विशेष प्रेम होतं.बहुदा त्यांना स्वतःचं मूल नव्हतं.नानखटाई खात खात मुलं पाव घेऊन खुशीत घरी येत.यशा आणि मंदा घरी येईपर्यंत घरात उठाउठ झाली होती.मामा अंथरुणावर बसूनच माई-बापूंशी गप्पा मारत होते.माई-मामींच्या आंघोळी झाल्या होत्या.अजित-माधुरी आणि मोन्याने कालच त्यांच्या माईआत्याला बजावलं होतं की,'दामू दूध काढायला आला की,आम्हाला उठव,आम्हाला दूध काढताना पाहायचंय.'
त्याप्रमाणे ते तिघेही परसदारी गाईंचं दूध कसं काढतात त्याची गंमत बघायला गेले होते.माईंनी चहा ठेवला. मुक्ताने तिच्या वाटचा पाव घेऊन नेहमीप्रमाणे पावाची मधली बाजू कोरून पावाची चूल करायला घेतली.
साडेनवाच्या आधीच दोन्ही तांगे आले.आंघोळी, नास्ता आटोपून सगळे तयारच होते.माई,बापू,मामा,मामी एका तांग्यात आणि मुलं सगळी बाबूच्या तांग्यात बसली. घरातून निघाल्यापासून यशाची रनिंग कामेंट्री चालू होती.सुरुवातीलाच बालाजीचं देऊळ,सराफ कट्टा, काळ्या मारुतीचं मंदिर आणि बच्चू हलवायाचं मिठाईचं दुकान...सगळ्यांची माहिती सांगेस्तोवर गाव संपलं. गावाबाहेर आल्यावर यशाने त्यांना स्टेशनकडे जाणारा रस्ता दाखवला.
मुक्ता म्हणाली,"भावड्या आता शेटजीचा बाग मी दाखवणार हं!"
देवळातला पुजारी माईंना ओळखत होता.त्याने माईंना आणि शकुमामींना गाभाऱ्यात जाऊन देवीची ओटी भरू दिली.
नारायणमामांनी नारळ वाढवला.
माईंनी सांगितलं, "हे जागृत देवस्थान आहे.कुणाला काय मागायचं असेल तर ते जगदंबेकडे मागा!"
सगळी मुलं डोळे मिटून काहीतरी पुटपुटली.घरी येता येताच मुलं आणि मामा-मामी खरेदीसाठी बाहेर पडले. गाव पैठणीसाठी प्रसिद्ध असल्याने मामीसाठी पैठणी, महेशकडून पेढे आणि प्रकाश भत्तेवाल्याकडून भेळभत्ता अशी मोठी खरेदी झाली.मामांनी यशा आणि मंदा-मुक्तासाठीदेखील पेढे-भेळभत्ता घेतला होता.
दुपारी जेवणं झाली.थोड्यावेळ पाठीची कळ मोडून मामा-मामींनी सामानाचं पॅकिंग सुरू केलं.यशाला उगाचच फार उदास वाटू लागलं."नारायणा,येत जा रे मधूनमधून.अगदी दिवाळी ते दिवाळी नको करायला ! आणि येताना शकूला अन् मुलांनाही आणत जा.मुलं बघ कालपासून कशी खूश आहेत!"नोकरीच्या व्यापात असं जमणं फार सोपं नाही हे माहीत असूनही मामांनी बळेच होकार भरला. संध्याकाळचा चहा झाला.बाबूचा तांगा बाहेर येऊन उभा राहिला.बाबूने सामान समोर त्याच्या पायाजवळच्या जागेत आणि पायट्यावर व्यवस्थित बसवलं.
मामांची मुलं तर तांग्यात जाऊन बसलीसुद्धा.मामी आणि बापू बाहेर ओट्यावर उभे राहून गप्पा मारत होते. माई सुखरूप प्रवासासाठी देवाजवळ दिवा लावत असताना मामा देवघरात आले.माईना नमस्कार करून 'मुलांसाठी अन् अडल्या-पडल्याला राहू दे' म्हणत हजार रुपये माईंच्या हातात ठेवायला लागले तर माईंनी शॉक बसल्यासारखा हात मागे घेतला.
"नारायणा ! तू खूप मोठ्ठा झाला आहेस मलापण तुझा अभिमानच आहे. पण मला काही कमी नाही आणि काही प्रसंग पडलाच तर तुम्ही आहातच. एवढा डोंगराएवढा भाऊ परमेश्वराने दिला आहे.मला काय कमी आहे? आणि आज येताना तू मुलांसाठी खाऊ आणलेलाच आहेस."
मामांना मनोमन खात्री होती की,माई कधीही त्यांच्याकडे पैसे मागणार नाही. मामांचा गळा गहिवरून आला. "माई! तुला काय गं कमी पडणार ! देवाने सोन्यासारखी मुलं दिली आहेत. लहानपणी मोठी बहीण म्हणून आमच्यावर जसे संस्कार केलेस तसेच मुलांवर केलेस हे पाहून खूप बरं वाटलं. काल तुझ्या यशाला पुढच्या वेळी येताना टॉवेल,टूथपेस्ट आणू का म्हटलं तर ज्या तडफेने त्याने नकार दिला तेपण समोरच्याचं मन न दुखवता, तेव्हाच मनात विचार आला, ह्या घराचा भविष्यकाळ नक्कीच उज्ज्वल आहे. सध्या गरिबी आहे पण दारिद्र्य अजिबात नाही."
दोघा बहिणभावांच्या डोळ्यांतून अखंड गंगा-यमुना वाहायला लागल्या.बाहेरून बापूंनी दोनदा हाका मारल्या,"चला! गाडीची वेळ झालीय..."
तेव्हा कुठे दोघेही डोळे पुसत बाहेर आले.निरोपाचे शब्द उच्चारले गेले.तांगा निघाला.नजरेआड झाला.माई परत देवघरात येऊन देवासमोर बसल्या.मघाशी त्यांच्या डोळ्यांत अश्रू पाहून बापूही समजूतदारपणे ओट्यावरच थांबले होते.तिन्ही मुलं कशीनुशी झाली.देवघरात जाऊन माईंना बिलगून बसली.
"माई,तू का बरं रडत होतीस?" समजूतदार मंदाने विचारलं.
तिघांनाही जवळ ओढत माई म्हणाल्या, "आनंदाश्रू होते ते! मुलांचं कौतुक ऐकलं की,प्रत्येक आईचं असंच होतं."
यशाला माई काय बोलल्या त्याचा अर्थ कळला नाही पण त्यांचा उबदार स्पर्श त्याला खूप सुखद आणि भारी वाटला.
समाप्त…!!