* विजय गायकवाड | Vijay Gaikawad

live

नमस्कार आपले स्वागत आहे. मी पुस्तके आणि मित्रांवर पैसे खर्च करतो,माझ्याकडे दगड आणि विटांवर खर्च करण्यासाठी पैसे नाहीत.- रस्किन बाँड.ही थोर माणसं व त्यांचे विचार मला पुस्तकात भेटलीत.ती भेटली आणि त्यांनी सांगितले कि, प्रत्येक दिवशी असं काही तरी करा की,ते तुम्हाला अधिक सुंदर उद्याच्या दिशेने खूप लांबवर घेऊन जाईल."- डोग फायरबाऊ.' सर्वियन कादंबरीकार मिलोराद पावीच यांचे एक वाक्य आहे ते म्हणतात - जोवर जगात पुस्तक वाचणाऱ्या वाचकांची संख्या बंदूकधारी सैनिका पेक्षा अधिक आहे तोवर काळजीच काहीच कारण नाही.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात.पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये.म्हणून अविरतपणे प्रयत्न करणारे मार्गदर्शक, मित्र धावून येतात.प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,डॉ.दीपक शेटे,आ.भरत बुटाले,प्रा.सर्जेराव राऊत,सुभाष ढगे,अनिल फारणे,डॉ.सुधीर सरवदे ,विश्वास खाडे, विनायक पाटील,संजय कुंभार,सतीश खाडे,मनोहर सुर्वे,गणेश खंदारे,तात्या गाडेकर, दादासाहेब गाडेकर, दादासाहेब ताजणे, पुस्तकातील घटना प्रसंग सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील यांनी केलेले आहे. मला लिहिण्याची प्रेरणा देणारी पुस्तके,लेखक,प्रकाशक,मित्र ही जगावेगळी माणसं माझ्या जीवनातील महत्वाचा टप्पा आहेत.... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ.मेघा गायकवाड, चिरंजीव मयान,माझ्या धावण्यातील गुरुवर्य नामदेव बरुरे,लुल्ला शेख मोठी ताई ,लहान ताई जयश्री शिंदे या सर्वांचेच मनापासून आभार व धन्यवाद मॅट्रिक फेल विजय गायकवाड

3/20/26

जितराबं / jitrab

बापू म्हणाले,"सरकार,माझं बोलणं पूर्ण तरी करू द्या. लक्ष्मी नावाची गाय आपल्याकडे येऊ घातलीय.काल संध्याकाळी नेहमीप्रमाणे अंगणगाव रोडला चालायला गेलो होतो.बऱ्याच दिवसांनी केशवराव पटेल बरोबर होते.आठ फर्लांग चालत जायचं म्हणजे बऱ्याच गप्पा होतात.केशवरावांचा मोठा कारभार आहे.गोधनदेखील खूप आहे.ते म्हणत होते,ह्या वर्षी चांगल्या कुटुंबांत पाच गायी द्यायचं त्यांच्या मनात आहे.त्यांनी विचारलं, 'बापूसाहेब,एक लक्ष्मी नावाची सवत्स धेनू आपली हरकत नसेल तर आपल्याला द्यावी असं मनात आहे.' मी म्हटलं,विचार करून उद्यापर्यंत सांगतो.आज संध्याकाळी ते भेटतील तर काय सांगू त्यांना ?"


माई क्षणभर विचार करून म्हणाल्या,"सवत्स धेनू स्वतःहून येतीय.तिला करंट्यासारखं नाही कसं म्हणायचं? थोडं काम वाढेल.गवताचा खर्चही वाढेल पण तेवढाच दुधाचा खर्चही कमी होईल."


तर अशा रीतीने लक्ष्मीचा वाड्यात प्रवेश झाला.ती येण्याच्या आधी मागच्या अंगणात आड,मोरीचा चौक आणि संडास ह्यांच्या मधल्या जागेत भिंतीलगत दावणं बसवली गेली.लक्ष्मीला पाणी प्यायला म्हणून वापरात नसलेलं गंगाळं चिंच लावून घासून चांगलं चकचकीत केलं गेलं.लक्ष्मी उंच,सडसडीत,तांबड्या-पांढऱ्या रंगाची गाय होती.तिची डौलदार पण लांब शिंगं तिला छान शोभत होती.तिच्या वासराचं नाव पहिल्याच दिवशी यशाने 'नंद्या' ठेवलं.


हळूहळू लक्ष्मी वाड्यात रुळली.लक्ष्मीचं खाणंपिणं माईच बघत.घर आणि अंगण झाडण्यात आता मागचं अंगणपण वाढलं होतं.

घरातले अन् मागच्या अंगणातलं भाडेकरू असलेलं मारवाडी कुटुंब त्या भागाला गोठा म्हणू लागलं.लक्ष्मीचं दूध काढायला,

सकाळ.- संध्याकाळ दामू यायचा.घरात दूध-दुभत्याची रेलचल व्हायला लागली.आठवड्यातले निम्मे दिवस आदल्या दिवशी मुद्दाम करून ठेवलेली बाजरीची भाकरी कुस्करून त्यावर गरम दूध हा नास्ता तिन्ही मुलांना आवडू लागला.सकाळचं.चहापाणी आटोपून माई व्यंकटेश स्तोत्र म्हणता म्हणता लक्ष्मीचा गोठा आवरत. त्यांचा बराच वेळ तिथे जाई.एकीकडे झाडताना,शेण गोळा करताना किंवा लक्ष्मीच्या पुढे गवत टाकताना व्यकंटेश स्तोत्र थांबवून माईच्या लक्ष्मीशी गप्पा चालत. त्याही इतक्या प्रेमाने की,कुणी नुसतं लांबून ऐकलं तर वाटावं,एखादी प्रेमळ स्त्री तिच्या लेकीशी बोलतेय. तिच्या पाठीवरून,अंगावरून हात फिरवता फिरवता माई म्हणत,"अगं,काल रात्रीचं खाणं तसंच पडलंय.भूक नव्हती का गं? वेळेवर खाल्लं पाहिजे बाई.केवढी सुकलीयस तू. लेकुरवाळीने खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष करून कसं चालेल?"


लक्ष्मी स्वभावाने थोडी हेकट नि तापट होती.कधी कधी ती माईंच्या बोलण्याला,अंगावरून मायेने हात फिरवण्याला चांगला प्रतिसाद देई तर कधी चक्क दुर्लक्ष करी.


एकदा तिचं काय बिघडलं,कोण जाणे! तिने माईंना अशी दुशी दिली की,भितळीवर आदळून माईंना चांगलंच खरचटलं.यशा आडाचं पाणी काढून आंघोळीसाठी बंबात भरत होता.धावत येऊन त्याने माईंना उठायला मदत केली आणि पळत बाहेर जाऊन बापूंची काठी आणली.माईंना काही समजायच्या आत त्याने लक्ष्मीला दोन सणसणीत रट्टे लगावले.ते पाहून माई कळवळल्या.

यशाला ओरडून थांबवलं.नंतर समजावत म्हणाल्या,


 "अरे,मुकं जनावर ते.प्रतिकार करू शकत नाही म्हणून का मारायचं ? आणि तिने काही मुद्दाम नाही ढकललं रे. तिने मान हलवली त्याच वेळेला मी नेमकी मध्ये आले. हो की नाही ग लक्ष्मी ?"


तेवढ्यात लक्ष्मीने मान हलवली.माई म्हणाल्या,"बघ ! हो म्हणतेय."


यशा मुकाट्याने काठी ठेवायला ओसरीकडे गेला.


नाताळाची सुट्टी आठवड्यावर आली आणि बापूंच्या डोक्यात आलं,ही सुट्टी शेतावर घालवावी.माईंनी शंका काढली,


"अहो पण राह्यचं कुठे?"


बापूंचं नियोजन पक्कं असे.त्यांनी कानडेंना त्यांच्या शेतातलं घर पंधरा दिवसांसाठी रायला मागितलं. कानड्यांचं शेत बापूंच्या शेताला लागूनच होतं.शिवाय कानड्यांचं स्वतःचं असं उसाचं खूप मोठं क्षेत्र असल्याने त्यांच्या वावरातच गुऱ्हाळ लावलं होतं.ते दोन महिने चालणार होतं.मग काय! यशा-मंदा-मुक्ता खूश !


बापू म्हणाले "तुम्हा सगळ्यांची तयारी असेल तर आपण घरीच बाजरीची कणसं ताटापासून वेगळी करू, मळणीपण घरीच करू म्हणजे मजूरीचे पैसेही वाचतील. माईला घरातलं अन् स्वैपाकपाण्याचंही काम असल्याने उरलेल्या सगळ्यांनी दररोज एका पाचुंद्याचं कणीस तोडायचं."


नवीन अनुभव म्हणून सगळे आनंदाने कबूल झाले.


"बापू,पाचुंदा म्हणजे किती?" लहानग्या मुक्ताने विचारलं.


बापूंनी सांगितलं,"बाजरीची ताटं शेतातून कापली की, त्याच्या छोट्या छोट्या जुड्या एकत्र बांधतात.एकेका जुडीत सुमारे पंधरा ताटं असतात.अशा पाच जुड्यांचा एक पाचुंदा होतो."


यशाने मनातल्या मनात पंधराचा पाढा म्हटला आणि मुक्ताला म्हटलं,"म्हणजे मुक्ता,प्रत्येकाने पंचाहत्तर कणसं ताटांपासून वेगळी करायची !"


गावगोत,माधव सावरगांकर,अष्टगंध प्रकाशन


आपण कसा बरोबर हिशेब केला म्हणून त्याने शाबासकीच्या अपेक्षेने बापूंकडे पाहिलं.त्यांनीही 'बरोबर !' म्हणून मान हलवली.


एकदा जायचं म्हटल्यावर यशा-मंदा-मुक्ता ह्यांचं मनोराज्यम् सुरू झालं.माई आणि बापू न्यायच्या सामानाची लिस्ट बनवण्याच्या कामी लागले. मनोराज्यम् करता करता अचानक एक गोष्ट यशाच्या लक्षात आली.त्यामुळे तो धावतपळत ओसरीवर


माई-बापू बसले होते तिकडे आला आणि म्हणाला,


"बापू, आपण शेतावर पंधरा दिवस राहणार मग लक्ष्मी आणि नंद्याचं काय ?"


बापूंनी कौतुकाने त्याच्याकडे पाहिलं आणि ते हसून म्हणाले,

"यशवंतराव,तिथेही आपल्याला दूध लागणारच ना? तेव्हा लक्ष्मीला आणि नंद्याला आपण आपल्याबरोबरच न्यायचं.तिथे चाऱ्याचाही प्रश्न नाही. बाजरीचं पाचट आहेच शिवाय आप्पा कानड्यांच्या मळ्यात भरपूर हिरवा चारा मिळेल. लक्ष्मी आणि नंद्या पंधरा दिवसांत चांगले ताजे पडतील."


आणि मग शेतावर जाण्याचा तो दिवस उगवला.बापूंनी तातूकाकांची एक आणि आप्पा कानड्यांची एक अशा दोन बैलगाड्या मागवल्या.एका गाडीत पंधरा दिवसांसाठी माईंनी बरोबर घेतलेल्या शिध्याची गाठोडी, सगळ्यांचे कपडे असं मिळून मोठाच रमणा झाला होता.कारण भाजणी,मेतकूट,

साबुदाणा,पोहे... असे बरेच काही जिन्नस सगळ्यांनी आठवून आठवून सुचवले होते.त्याच समानाच्या गाडीत नंद्याला बांधून ठेवलं होतं. लक्ष्मीच्या गळ्यातलं चऱ्हाट त्याच गाडीच्या मागच्या बाजूच्या कडीला बांधलं.नंद्याच्या ओढीने ती चटचट पाय उचलील ही अटकळ होती.


दुसऱ्या गाडीत खाली पायऱ्यांवर जाड जाजम घातलं. शेतावरच्या मुक्कामासाठी अंथरुण-पांघरुणं लागणारच होती.तीच खाली टाकल्याने गाडीत चांगली गुबगुबीत बैठक तयार झाली होती.बापू आणि माई तिन्ही मुलांसह गाडीत बसले.एक तर दोनपैकी एक गाडी यायला उशीर झाला.गोठ्यातून मागच्या दरवाजाने बाहेर रस्त्यावर यायला लक्ष्मीने खूपच खळखळ केली.त्यामुळे गाड्या ढळायला साडेपाच वाजून गेले.चार कोसांचं अंतर तोडून रात्री आठ साडेआठपर्यंत मुक्कामी पोहचू हा निघतानाचा अंदाज होता.अर्थात थोडं इकडं तिकडं चालणार होतं.कारण रात्रीच्या जेवणासाठी माईंनी दशम्या आणि पीठ पेरून कांद्याची भाजी केली होती.


लक्ष्मीने सुरुवातीपासूनच नाठाळपणा करायला सुरुवात केली होती.ती फारच हटून बसली की,कुणीतरी गाडीतून उतरून तिला हाकलायचं,लक्ष्मीमुळे प्रवासाचा वेग खूपच मंदावला.अंधार पडू लागला.निम्मा रस्ता कसाबसा पार झाला पण आता अंधार गडद झाला होता.थंडीदेखील झोंबरी झाली होती आणि अचानक लक्ष्मीने बसकण मारली.काही केल्या ती उठेना.माई गाडीतून खाली उतरल्या.लक्ष्मीला थोपटून,आंजारून-गोंजारून त्यांनी उठवायचा प्रयत्न केला.पण लक्ष्मीचा असहकार काही संपेना.आता काय करावं,हा प्रश्न सगळ्यांच्याच पुढे पडला.


बरं,एका गाडीला अंधारात एकटं सोडणंसुद्धा शक्य नव्हतं.माईंच्या आधी बापूपण खाली उतरले होते. अंधारात आजूबाजूला पाहताना त्यांना लांबवर एकदोन मंद दिवे दिसले.त्यांनी गाडीवाल्याला विचारलं,


"श्रीपती,कुठल्या रे वस्तीचे दिवे आहेत हे?"


"धानोऱ्याची बेरडांची वस्ती हाये जी."


श्रीपतीचं उत्तर ऐकताच बापूंच्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या.रेव्हेन्यूमध्ये काम करताना त्यांना काही दिवस मॅजिस्ट्रेटची पॉवर होती,त्यावेळी धानोऱ्याच्या भिम्याची केस त्यांच्यासमोर आली होती.भीमा त्यावेळी त्या भागातला नामचीन दरोडेखोर होता.बापूंनी त्याला त्यावेळी सहानुभूतीने आणि माणुसकीने वागवलं होतं.


"श्रीपती,भिम्या आहे का रे अजून?"


"हाय की.पिकलाय आता,पन तब्येत तशीच कातळासारखी हाये.बस,तोंडावर थोड्या झुऱ्या पडल्याती." श्रीपतीने माहिती पुरवली.


त्यावर बापू म्हणाले,"श्रीपती,आम्ही इथेच थांबतो.तू गाडी सोड आणि वस्तीवर जाऊन भिम्याला सांग मी आलोय.

रस्त्यात आमच्या गायीने बसकण मारलीय."


श्रीपती बापूंच्या सांगण्याप्रमाणे निघाला.अर्ध्या तासाने श्रीपतीसोबत तीनचार जण येताना दिसले.भिम्याने आल्या आल्या बापूंच्या पाया पडून नमस्कार केला.


"देवा,आज माझं भाग्य उजाडलं.तुमचं पाय आमच्या वस्तीला लागले.इतक्या जवळ आलात.आता बिनघोर राहा.तुमची गाडी घेऊन तुम्ही म्होरं ढळा.मी येतो जनावराला घिऊन.शिरपती म्हनत व्हता कानड्याच्या वावरात पंश्वा दिस मुक्काम हाये म्हूनत पंध्रा दिस मी खळ्यात वस्तीला येईल.बाहेरच आळं करून पडल, वहिनीसाहेब आन पोरं बरोबर हायेत.काही दगा फटका होवाया नगं."


म्हाताऱ्या भिमाकडे बघत बापू मुद्दाम म्हणाले,"भिम्या, चारपाच जवान पोरं दांडकं घेऊन आले तर एकटा काय करशील रे?"


पांढऱ्या झालेल्या मिशांच्या झुबक्यांवर मूठ फिरवत भिम्या म्हणाला,"देवा,भिमा राखणीला हाय हे समजल्यावर कानड्याचं शिवारच काय,पण पंचक्रोशीतही कुनी फिरकायचं न्हाई."


बापू आणि माईंची गाडी निघेपर्यंत लक्ष्मीच्या पोटाखाली फळकुट घालून तिला उभी करण्याचे प्रयत्न सुरू झाले होते.


दुसऱ्या दिवशी माई सकाळी घराच्या बाहेर अंगणात आल्या तेव्हा लक्ष्मी नंद्याला चाटत उभी असलेली त्यांना दिसली.भिम्या 'रात्री परत येईन' असा निरोप ठेवून पहाटे अंधारातच आपल्या वस्तीवर गेला होता.पुढचे पंधरा दिवस मुलं पाखरांसारखी मुक्त फिरत होती. सकाळचा नास्ता झाला की,प्रत्येक जण एक पाचुंदा बाजरीची ताटं घेऊन विळ्याने कणसं वेगळी करत, हसतखेळत चुरशीने काम करत होता.अकराच्या सुमारास काम संपायचं.दोनशे फुटांवरच गुऱ्हाळाची काहील ठेवली होती.गूळ बनवतानाच्या आणि जाळाची भट्टी पेटती ठेवण्याच्या आवाजाने वातावरणात जाग होती.प्रत्येक वेळेला काहील उतरण्याच्या सुमारास तिन्ही मुलं उसाची टिपरी घेऊन वाट पाहत.काहील उतरल्यावर थोड्याच वेळात गुळावरती साय येई. त्याच्यावरून हातातली टिपर गोल गोल फिरवून ती साय नंतर थोडी थंड झाल्यावर खाण्यातला अवर्णनीय आनंद लुटताना त्यांना परमोच्च समाधान मिळे.


एक दिवस एका गुळ्याने एक एकदम वेगळाच पदार्थ सांगितला.गरम गुळात मुरमुरे-शेंगदाणे घालून केलेले लाडू चांगले तर लागतातच पण त्याच्या सांगण्यावरून बापूंनी त्याला खोबऱ्याच्या सातआठ वाट्या आणि स्टीलची तार आणून दिली.त्याने त्या वाट्या त्या तारेतून ओवून उसाच्या रसाबरोबर काहिलीत सोडल्या.उसाच्या रसाबरोबर त्या वाट्या काहिलीत गूळ तयार होईपर्यंत ठेवल्या.काहील उतरायच्या आधी त्या बाहेर काढल्या. त्याची चव मुलांनाच काय पण माई-बापूंनाही अवीट आणि अविस्मरणीय वाटली.


शेतावर राह्यला जाऊन आठ दिवस झाले होते.एकदा कणसं तोडत बसलेल्या यशाला बापूंनी लक्ष्मीला लिंबाच्या सावलीत बांधायला सांगितलं.यशा फुशारकीत उठला.लक्ष्मीचं दावं सोडून तिला तो लिंबाकडे घेऊन जायला लागला.आजूबाजूचं हिरवंगार गवत पाहून लक्ष्मी तिकडे जाऊ बघत होती आणि त्यामुळे यशा तिकडे ओढला जात होता.यशा जोर लावून तिला लिंबाकडे खेचत होता.शेवटी लक्ष्मीने यशाला डोक्याने उचललं आणि बाजूला फेकलं.यशा सातआठ फुटांवर फेकला गेला.माई, बापू, गुऱ्हाळात काम करणारी माणसं... सगळी धावली.ती येऊन पोहचेस्तोवर यशा अंगाला लागलेली माती झटकत उभासुद्धा राहिला. जवळ कणसं तोडायला,मदत करायला बसलेला श्रीपती म्हणाला,


"जनावर लै हुशार ! छोट्या मालकांना असं कोलवलं की,त्यांना शिंग लागू दिलं नै का इजा होऊ दिली नै." 


राहिलेला भाग पुढील लेखामध्ये..



3/18/26

मृच्छकटिक / Mrichchakatik

काही शतके बुद्धविचार हा भारतात मोठ्या प्रमाणावर स्वीकारला गेला आणि त्यातून समाज ढवळून निघाला. ह्या मंथनातून निर्माण झालेल्या समाजाचे चित्रण मृच्छकटिक नाटकात दिसते.फार रेखीव,वस्तुनिष्ठ असे चित्रण,अतिशय उदार,स्वार्थाचा विचार न करणारा व्यापारी वर्गातला चारुदत्त हा श्रेष्ठी मृच्छकटिकाचा नायक आहे.सढळ हाताने मित्रांना मदत करताना तो अकिंचन बनलेला आहे.त्याच्या मुलाला तर आपल्यासारख्या श्रीमंत वर्गातल्या इतर मुलांप्रमाणे खेळायला सोन्याची गाडी-सुवर्णशकट हवे आहे.पण आता त्याच्या नशिबी आहे मातीची गाडी - मृत्शकट. चारुदत्तावर गावातली अति धनाढ्य गणिकर,वसंतसेना भाळली आहे.ती चारुदत्ताच्या मुलाचा आकान्त पाहून चारुदत्ताकडे आपले मूल्यवान सोन्याचे दागिने ठेवून जाते.वसंतसेनेमागे लागला आहे,जुलमी राजाचा मेहुणा, शकार.पण गणिका असूनही ती त्याला वश होत नाही. ह्याच राजाने केवळ ज्योतिषावर विश्वास ठेवून एका निष्पाप तरुण गवळ्याला तुरुंगात टाकले आहे.जेव्हा चारुदत्त आपल्या मित्र विदूषकाला वसंतसेनेचे दागिने परत करायला पाठवितो,तेव्हा तो वसंतसेनेची संपत्ती व तिच्या सहगणिकांबरोबर चाललेली श्रीमंतांच्या मुलांची चंगळबाजी पाहून थक्क होतो.हे सगळे धुरातत्त्वाला धरूनच आहे.समाजात स्वतःची प्रतिष्ठा प्रस्थापित करण्यासाठी कशी अचाट उधळपट्टी केली जाते ह्याचे नेटके वर्णन आहे.पण प्रस्थापित उच्च-नीच भाव मुकाट्याने सहन करण्याची जरूर नाही,जुलमाविरुद्ध धाडसाने प्रतिकार करून प्रचंड प्रतिष्ठा कशी प्राप्त होऊ शकते,हेही मृच्छकटिकात पुढे दाखवले आहे.जुलमी राजाचा वध करून हकनाक तुरुंगात टाकलेला गवळी तरुण स्वतः राजा बनतो.शिवाय चारुदत्त क्षमा, ्शांती अशी स्वार्थपरायणतेच्या अगदी वेगळी,बुद्धाच्या शिकवणीला अनुरूप,मूल्येही बाळगतो.ज्या जुलमी राजाच्या दुष्ट मेहुण्याने त्याच्यावर खुनाचा खोटा आरोप लादला होता,त्याला राजाचा वद झाल्यावर चारुदत्त उदार मनाने क्षमा करतो.


वसंतसेना नायकिणीच्या वाड्याचे वर्णन ह्या लावणीत, आपण किती प्रचंड खर्च करू शकतो ह्याचा दिमाख दाखवण्याच्या मानवी प्रवृत्तीचे सुरस चित्र डोळ्यापुढे उभे केले आहे.


वसंतसेना नायकिणीचा वाडा अवलोकुनी ।। जाहला दंग विदूषक मनी ।।धृ ।। चौबाजूनी चार जयाला उंच कोट बांधिले ।। तयामधि आठ चौक साधिले ।। पुढल्या दरवाजाच्या बाहिर हस्तिदंत मढविले ।। जरीचे वरती ध्वज लाविले ।। चंदन कुंकुम यांचे द्वारापुढे सडे घातले ।। त्यांवरी रंगवेल काढिले ।। चाल. ।। दोबाजूला सुवर्ण कुंभ शोभती ।। त्यांवरी फुलांचे स्थूळहार लोंबती ।। हलवी शुंडा जाणो ऐरावती ।। चाल पहिली ।। शोभित केला सुदृढ कपाटे हेमाची लावुनी ।। पहावा दुर्लभ ऐसा जनी ।। वसंतसेना नायकिणीचा वाडा अवलोकनी ।। जाहला दंग विदूषक मनी ।।१।। पहिल्या चौकामध्ये चौकडे रंगमहाल देखिले ।। तयाचे जिने जडित पाहिले ।। खर्णोखणी झुंबरे फानसे अरसे ही लाविले ।। रुजामे गजनीचे घातले ।। भरगच्चीचे पडदे लावुनि गुंडाळुनि ठेविले ।। खांब किनखापांनी मढविले ।। चाल ।। खिडक्यांवरती मोत्यांच्या झालरी ।। चौकांत चांदणी एके खांबावरी ।। वाटे आला इंद्राच्या मंदिरी ।। चा. प.।। पाहुनि शोभा करी अचंबा अहा काय ही घनी ।। कळेना पुढे अधिक याहुनी ।। वसंतसेना नायकिणीचा ।।२।। दुसऱ्या चौकामध्ये गाडिचे बैल थोर बांधिले ।। खाउनी रतिब पुष्ट जाहले ।। वेसण घालुनी लढाउ रेडे वर बांधुनि टाकिले ।। तयांच्या शिंगा तुप माखिले ।। लढाइ लावुनि मस्त एडके माघारे आणिले ।। तयांच्या माना रगडिति भले ।। चाल ।। अश्वांच्या कोणी आयालीस घांशिती ।। विंचरुनी त्यांच्या वेण्याही घालिती ।। हत्तीला कोणी जपुन रतिब चारिती ।। चा. प. ।। चोरापरि सांखळिने वानर टाकियला बांधुनी ।। पाहतो डोळे गुरकावुनी ।। वसंतसेना नायकिणीचा वाडा ।।३।। धनवंताचे पुत्र विलासी कामुक होउनि भले ।। आपुल्या गृहासि जे पातले ।। त्यांस बसाया मऊ रुजामे गर्दपोस पसरिले ।। तयांवर गालीचे टाकिले ।। रत्नखचित सोंगटी बुदबळे भर्जरिपट मांडिले ।। सवे खेळाया विट बैसले ।। चाल ।। चौरंगांवर उघडुनिया पुस्तके ।। वाचायाला ठेवियली कौतुके ।। जिकडे तिकडे सर्व दिसें नेटकें ।। चा. प. ।। पानसुपारी फुले फळावळ ताटामधि घालुनी ।। ठेविली मधे मधे मांडूनी ।। वसंतसेना नाय. ।।४।। चौथ्या चौकामध्ये नाना वाद्यध्वनि ऊठती ।। धिमिद्धिमि मृदंग मृदु वाजती ।। घेउनि वीणा त्यांच्या तारा बोटांनी हलविती ।। कोणी ही सारंगी घांशिती ।। सारिगमपधनी निधपमगरिसा सप्तसूर अळविती ।। जपुनिया तालगती साधिती ।। चाल ।।


कोणी गणिका गायन अभ्यासिती ।। कोणी तिकडे नाचाया शिकविती ।। कोणी त्याला हावभाव दाविती ।। चा. प. ।। कोणी माडीवरून खिडक्यांमध्ये उभ्या राहुनी।। ऐकती फार लक्ष लावुनी ।। वसंतसेना नाय. ।।५।। या चौकामधि नानापरिंची पक्कान्ने निर्मिती ।। करावी त्यांची गणती किती । केशर कस्तुरि गरम मसाले पाट्यावर वाटिती ।। तयांचे वास फार सूटती ।। हिंग जिऱ्यांच्या देति फोडण्या घेउनि थावर हती ।। तयांची खमंगाइ पसरती ।। चाल ।। इकडे कोणी श्रीखंडे गाळितो ।। तिकडे कोणी अटिव खीर घाटितो ।। तिकडे कोणी वांगिभात उकरितो ।। चा.प.।। कोणि म्हणेना भटजीबावा हातभार धूवुनि ।। बसावे भोजनास येउनी ।। वसंतसेना. ।।६।। येथे दरवाज्यास मुलामा सोन्याचा लाविला ।। त्यावरी रत्नराशि जोडिला ।। नानाविधभूषणे कराया शिल्पीजन बैसला ।। जवळ रत्नांचा ढिग घातला ।। त्या विप्राने संपत्तीचा डौल असा पाहिला ।। मनामधि चकित होउनि राहिला ।। चाल ।। कोणी मोती सूत्राने गुंफिती ।। कोणि भूषणे रेशमांत पटविती ।। कोणी रत्ने सहाणेवर घांशिती ।। चा.प. ।। कामी आणि कामिनी विनोदें मदिरारस पीवुनी ।। बैसली करांत कर घालुनी ।। वसंतसेना. ।।७।। या चौकामधि तहेत-हेचे पक्षी बहु पाळिले ।। तयांला भव्य गेह बांधिले ।। शुक पिक मैना बोलति त्यांला पिंजऱ्यात घातले ।। ते वरी खुंट्याला टांगिले ।। कपोत सारस राजहंस ते मोकळेच सोडिले ।। फिरति डौलाने जैसे भले ।। चा.।। लावक तित्तिर यांची युद्धे किती ।। मत्त मयूरी डौलाने नाचती ।। पुच्छे अपुली पाठीवर पसरिती ।। चा.प. ।। रांवा बोले मैना डोले हेच नवल देखनी ।। जना आनंद होतसे मनी ।। वसंतसेना. ।।८।। या बागेला अद्भुत शोभा फुलझाडे आणिती ।। सुवासिक रंगित बहु दीसती ।। जाइजुई मोगरा माधवी सोनटका शेवंती ।। चमेली गुलाब आणि मालती ।। मरवा दवणा पाच सुवासिक यांचे तक्ते किती ।। लागले त्यांची न करवे मिती ।। चा. ।। त्यांतहि फारच शोभा जळमंदिरी ।। कारंजाच्या धारा उडती वरी ।। भासे पर्जन्याची दृष्टी खरी ।। चा. प. ।। त्रैलोक्यांतिल शोभा येथे आलि जमा होउनी ।। वाटले ऐसे माझे मनी ।। वसंतसेना नायकिणीचा वाडा अवलोकुनी ।। जाहला दंग विदूषक मनी ।।९।।


( 'वारुळ पुराण',माधव गाडगीळ',ई.ओ.विल्सन,अनुवाद - नंदा खरे,मनोविकास प्रकाशन )


मृच्छकटिकात दिसते की आपण किती सामर्थ्यवान आहोत हे दाखवण्याच्या अगदी वेगळ्या दोन रीती मानवी समाजात वापरल्या जातात.म्हणतात ना,सगळी सोंगे आणता येतात,पण पैशाचे सोंग आणता येत नाही. अगदी निष्कारण पैसे उडवायला आपल्याकडे खरेच पैसे हवेत.ह्यातून श्रीमंतांची उधळपट्टी उभी झाली आहे, आणि आज तर मोठ्या प्रमाणावर असे जोखड बाळगलेले बघायला मिळते.पण आपण किती सामर्थ्यवान आहोत हे अगदी वेगळ्या प्रकारे दाखवता येते - बलदंडांना,सत्ताधीशांना त्यांच्या अन्याय्य वर्तणुकीबद्दल आव्हान देऊन.

मृच्छकटिकातला अन्यायी राजाचा वध करणारा,अगदी साध्या कुटुंबातला तरुण गवळी हा अशा आव्हानाचे प्रतीक आहे. ...अपुर्ण...

3/16/26

५.७ पेशी विभाजन / 5.7 Cell Division

कोणत्याही सजीवाला जिवंत राहण्यासाठी,वाढ होण्यासाठी आणि प्रजनन करण्यासाठी पेशी विभाजन करणं गरजेचं असतं.पण सगळेच सजीव सारख्याच प्रकारे पेशी विभाजन करतात का? पेशींचेच विशेषतः न्यूक्लियस नसलेले प्रोकॅरिऑटिक आणि न्यूक्लियस असलेले युकॅरिऑटिक असे दोन प्रकार असतील तर या दोन्हीही पेशी एकाच प्रकारे पेशी विभाजन करतात का? असे प्रश्न एकोणिसाव्या शतकातल्या वैज्ञानिकांना पडायला लागले होते.पेशी हेच सगळ्या सजीवांचं मूळ एकक असतं हे आता सेल थिअरीनं सिद्ध झालं होतं.त्यानंतर रॉबर्ट ब्राऊन यानं पेशीमध्ये न्यूक्लियस असतो हेही सांगितलं होतं. अर्थात,हा न्यूक्लियस हा युकॅरिऑटिक पेशीमध्ये त्यानं पाहिला असणार.कारण प्रोकॅरिऑटिक पेशीमध्ये न्यूक्लियस नसतोच. या पेशींमधला DNA हा न्यूक्लियस शिवायच पेशीमध्ये तरंगत असतो.पेशीचं पेशी विभाजन होताना त्यातल्या DNA ची आणखी एक प्रत (कॉपी) पेशीमध्येच तयार होते. त्याला DNA रेप्लिकेशन म्हणतात.त्यानंतर DNAच्या दोन कॉपीज पेशीच्या दोन टोकांकडे प्रवास करतात आणि पेशी द्रवही विभागलं जातं आणि पेशी पटल (सेल मेंब्रेन) मध्ये संकुचित होऊन दोन टोकांकडून जोडली जाते आणि दोन वेगवेगळ्या पेशी तयार होतात. पेशी विभाजनाच्या या साध्या प्रकाराला बायनरी फिशन असं म्हणतात.बॅक्टेरियांसारख्या प्रोकॅरिऑटिक पेशींचं विभाजन बायनरी फिशननंच होतं.या प्रोकॅरिऑटिक पेशींपासूनच प्रगती होत होत उत्क्रांतीमध्ये युकॅरिऑटिक पेशी तयार झाल्या असं वैज्ञानिक मानतात.गंमत म्हणजे प्रोकॅरिऑटिक आणि युकॅरिऑटिक अशा दोन्ही प्रकारांच्या पेशींमध्ये सेल सायकल म्हणजे पेशी विभाजनाचं चक्र सारखंच असतं! त्यामुळेच तर माणसासारख्या प्रगत प्राण्याच्या शरीरातल्या पेशीचं पेशीचक्र (सेल सायकल) कसं चालतं हे शोधताना वैज्ञानिकांनी प्रोकॅरिऑटिक पेशी आणि यीस्टसारख्या युकॅरिऑटिक पेशींचा अभ्यास केला.

या पेशी विभाजनाचा अभ्यास सगळ्यात पहिल्यांदा एकोणिसाव्या शतकातला जर्मन बॉटनिस्ट ह्यूगो फॉन मोहल यानं केला.ह्यूगो फॉन मोहलचा जन्म जर्मनीतल्या वुटेंबर्ग भागात झाला.त्याचे वडील बेंजामिन फर्डिनांड फॉन मोहल राजकारणातली
प्रसिद्ध असामी होती.मोहलच्या आई आणि वडील या दोन्ही बाजूंचे नातेवाईक खरं तर त्या प्रांतातली श्रीमंत आणि राजकारणातली मातबर असामी होते.त्यामुळे मोहलला खरं तर जिम्नॅशियम स्कूलमध्ये घातलं होतं. पण ते करत असताना त्याला बॉटनी (वनस्पतिशास्त्र) आणि मिनरॉलॉजी (खनिजांचा अभ्यास) यात खूपच आवड निर्माण झाली आणि या विषयांत खरोखरच त्यानं आयुष्यभर अभ्यास केला. १८२३ मध्ये त्यानं तुबिंजेन या विद्यापीठात प्रवेश घेतला.तिथे त्यानं डिस्टिंक्शनमध्ये मेडिकलची पदवी मिळवली आणि त्यानं लहानपणीच बॉटनीमध्ये करीअर करायचं ठरवलेलं असल्यामुळे पुढे बॉटनीमध्ये संशोधन करायला म्युनिचमध्ये गेला.म्युनिचमधला अभ्यास झाल्यानंतर तो पुन्हा तुबिंजेन विद्यापीठात गेला आणि तिथे आयुष्यभर बॉटनीचा प्रोफेसर म्हणून राहिला.

वनस्पतींच्या अभ्यासात आणि वाचनालयातच त्याचं मन इतकं रमायचं,की त्या नादात त्यानं लग्नच केलं नाही.आयुष्यभर तो अविवाहितच राहिला. यशिवाय आणखी एक वेड त्याला होतं,ते म्हणजे मायक्रोस्कोपसाठी जास्तीत जास्त चांगलं भिंग तयार करणं.याच कामात त्यानं स्वतःला इतकं झोकून दिलं होतं,की तो यात त्या काळात खूपच निष्णात झाला. त्या काळातल्या कोणत्याही चांगल्या यंत्रानं निर्माण केलेल्या भिंगापेक्षा जास्त चांगलं भिंग तो स्वतःच्या हातानं तयार करत होता!

वनस्पतिशास्त्राचा अभ्यास करताना त्याची स्वतःची काही तत्त्वं होती.ती त्यानं कायम पाळली.पहिलं म्हणजे तो आपल्या शिक्षकांवरही विश्वास ठेवायचा नाही.शिक्षक जे शिकवतील ते सगळं तो प्रयोगशाळेत स्वतः ताडून पाहायचा आणि मुळात जे काही नवीन शिकायचं ते कोणत्या शिक्षकाकडून शिकण्यापेक्षा स्वतःच वेगवेगळी पुस्तकं वाचून तो शिकून घ्यायचा.त्यानं स्वतःच स्वतःला घडवलं होतं. 

याच बळावर तो १८६८ साली रॉयल सोसायटीचा फॉरेन फेलो म्हणून निवडून आला होता.त्याला मायक्रोस्कोपी आणि बॉटनी या दोन्ही गोष्टींत रस असल्यामुळे तो अनेकदा मायक्रोस्कोपखाली वनस्पतींचं निरीक्षण करायचा.त्यातून त्याला अनेक नव्या गोष्टी समजल्या. पेशीमध्ये न्यूक्लियसच्या भोवती एक द्रव असतं हे निरीक्षणही त्यानं केलं होतं.त्याला त्यानंच 'प्रोटोप्लाझम' हे नाव सुचवलं. १८३५ साली तो प्रकाशसंश्लेषण (फोटोसिंथेसिस) करणाऱ्या ग्रीन अल्गीवर काम करत होता.तेव्हा त्यानं त्या अल्गीमध्ये पेशी विभाजन होताना पाहिलं.हाच पेशी विभाजनाचा पहिला शोध होता.त्यानं पुढेही पेशी आणि टिश्यूजवर (ऊतींवर) खूप काम केलं.त्यानंच पुढे पेशी विभाजनाच्या वेळी प्रोटोप्लाझमचं महत्त्व सांगितलं.

त्यानं पुढे आपलं संशोधन द्विदल वनस्पतींवर केंद्रित केलं.शिवाय,त्यानं-वनस्पतींच्या एक गट असलेल्या जिम्नोस्पर्जवरही बरंच काम केलं.वनस्पतींच्या पानांची रोमछिद्रं कशी बंद होतात आणि उघडतात यावरही त्यानं बरंच संशोधन केलं.

१८७२ मध्ये मृत्यू होईपर्यंत त्याचं संशोधन चालूच होतं. १८३५ मध्ये ह्यूगो फॉन मोहल यानं पेशी विभाजन शोधल्यानंतर १९४३ साली कृर्त मिशेल यानं फेज कॉंट्रास्ट मायक्रोस्कोपमधून त्याची पहिल्यांदाच फिल्म घेतली.

पेशी विभाजन

पेशी विभाजनानं एका पेशीच्या दोन पेशी होतात.पेशी विभाजन हे खरं तर सेल सायकल या पेशी विभाजन चक्राचाच एक भाग आहे.युकॅरिऑटिक पेशींमध्ये दोन प्रकारचे पेशी विभाजन होते.त्यातली एक व्हेजिटेटिव्ह सेल डिव्हिजन आणि दुसरी रीप्रॉडक्टिव्ह सेल डिव्हिजन असते.व्हेजिटेटिव्ह पेशी विभाजनामध्ये प्रत्येक पेशी आपल्यासारखीच दुसरी पेशी निर्माण करते किंवा एका मूळ पेशीच्या दोन नव्या पेशी तयार होतात. त्याला मायटॉसिस म्हणतात. आणि दुसऱ्या प्रकारच्या पेशी विभाजनामध्ये मूळ पेशीमध्ये जितके क्रोमोसोम्स असतील त्याच्या निम्मे क्रोमोसोम्स नव्या पेशींमध्ये येतात.या प्रकारच्या पेशी विभाजनाला मियॉसिस म्हणतात. मियॉसिसमध्ये एकदा DNAचं रेप्लिकेशन होतं आणि दोनदा त्याचं विभाजन होतं.अशा प्रकारे त्यातून मग क्रोमोसोम्सचे चार सेट तयार होतात.यात एका मूळ पेशीपासून चार नव्या पेशी तयार होतात.मियॉसिसमध्ये तयार झालेल्या पेशींना गॅमेट्स (बीजांड आणि स्पर्ज) म्हणतात.प्रत्येक उभयलिंगी युकॅरिऑटिक प्राण्याच्या शरीरात दोन्ही प्रकारचं पेशी विभाजन होतं.

बॅक्टेरिया आणि आर्किया अशा प्रोकॅरिऑटिक पेशींमध्ये साधं व्हेजिटेटिव्ह पेशी विभाजन होतं.शिवाय त्यांच्यात कधीकधी झाडाला पान फुटावं तसां फुटवा फुटून बडिंगही होऊ शकतं.पण प्रत्येक पेशीत आधी DNA चं रेप्लिकेशन हे होतंच.

अमिबासारख्या एकपेशीय प्राण्यांमध्ये पेशी विभाजनाचं एक चक्र (मायटॉसिस) पूर्ण झालं की त्यांचं प्रजनन होतं.पण बहुपेशीय प्राण्यांमध्ये तसं होत नाहीत. बहुपेशीय प्राण्यांची वाढच फक्त मायटॉटिक पेशी विभाजनानं होते.पण त्यांचा प्रजननाच्या वेळी मात्र मियॉसिस या पेशी विभाजनानं आपले गॅमेट्स (सेक्स सेल्स किंवा बीजांड आणि शुक्रजंतू) तयार करावे लागतात आणि मग हे गॅमेट्स एकत्र आल्यानंतर त्यांचा पुन्हा एकपेशीय झायगोट (युग्मज) तयार होतो आणि मग मात्र त्या झायगोटचं मायटॉसिस प्रकारानं पेशी विभाजन होत होत त्यापासून संपूर्ण सजीव तयार होतो. पुन्हा हा जीव जेव्हा त्याचे गॅमेट्स तयार करतो तेव्हा ते जर्मायनल पेशींपासून गॅमेट्स तयार करतं.आणि हे चक्र अखंड सुरू राहतं.गर्भधारणा झाल्यानंतर एका झायगोटच्या पेशी विभाजन होत होत माणसाच्या शरीरात त्याच्या संपूर्ण आयुष्यात १० काड्रिलियन वेळा पेशी विभाजन होतं!

पण प्रत्येक वेळी पेशी विभाजन होण्यापूर्वी नव्या पेशीमध्ये संपूर्ण DNA.चा संच पाठवणं हे त्या सजीवाची जात टिकवण्यासाठी गरजेचं असतं.त्यामुळे पेशीचक्रात मायटॉसिस म्हणजे प्रत्यक्ष पेशी विभाजन होण्यापूर्वी DNA रेप्लिकेशन होणं गरजेचं असतं. DNA रेप्लिकेशनमुळे त्या त्या सजीवाची संपूर्ण आनुवंशिक माहिती नव्यानं तयार होणाऱ्या पेशीमध्ये पाठवली जाते.त्यामुळेच कोणत्याही प्राण्याची सगळी आनुवंशिक माहिती पुढच्या पिढीत पाठवली जाते. त्यामुळे कोणत्याही प्राण्याच्या कोणत्याही प्रकारच्या पेशीमध्ये आपल्याला त्या प्राण्याचा संपूर्ण जेनेटिक मटेरिअल म्हणजेच सगळे क्रोमोसोम्स मिळतात.

पेशी विभाजनाचे टप्पे

पेशी चक्रामध्ये G1, S, G2 आणि M हे टप्पे असतात. त्यापैकी प्रत्यक्ष पेशी विभाजनापूर्वी म्हणजेच मियॉसिस किंवा मायटॉसिस आणि सायटोकायनेसिस या टप्प्यांपूर्वी पेशीला G1, S आणि G2 या टप्प्यांमधून जावं लागतं.या सगळ्यांना मिळून इंटरफेज म्हणतात आणि उरलेल्या टप्प्याला M फेज म्हणतात. इंटरफेजमधले सगळे टप्पे व्यवस्थित पार पडले की मग पेशी M फेजमध्ये येते.त्यात मायटॉसिस किंवा मियाँसिस होतं.

प्रत्यक्ष पेशी विभाजनाचे म्हणजेच मायटॉसिसचे प्रोफेज,प्रोमेटाफेज,मेटाफेज,अ‍ॅनाफेज आणि टिलोफेज असे पाच टप्पे पडतात.आणि त्यानंतर प्रत्यक्ष एका पेशीच्या दोन पेशी होतात.याला सायटोकायनेसिस म्हणतात.

प्रोफेज

प्रोफेज हा पेशी विभाजनातला पहिला टप्पा आहे.या टप्प्यात पेशीच्या न्यूक्लियसचं (पेशी केंद्रकाचं) आवरण तुटतं आणि पूर्वी न्यूडल्सनं भरलेल्या बाऊलासारख्या दिसणाऱ्या क्रोमॅटिनचे (DNAचे) चे धागे आकुंचित होऊन व्यवस्थित गुंडाळले जातात आणि त्यांचे वेगवेगळे दिसून येतील असे क्रोमोसोम्स तयार होतात. (म्हणजेच पहिल्यांदा क्रोमोसोम्सचा शोध लागला तेव्हा श्लायडेन,व्हर्च्यू आणि बुशेली (Schleiden, virchow and Butschli) या वैज्ञानिकांना मायक्रोस्कोपखाली या पेशी विभाजन होत असलेल्या प्रोफेजमधल्या पेशी दिसल्या असल्या पाहिजेत!) इथे आपल्याला x च्या आकारासारखे दिसणारे क्रोमोसोम्स हे मुळातच सिस्टर क्रोमॅटिडची एक जोडी असते.ती सेंट्रोमियरला जोडली गेलेली असते.कारण सिंथेसिस फेजमध्ये संपूर्ण DNA च्या संचाची आणखी एक प्रत तयार झालेली असते. आणि ते एकमेकांना अजूनही जोडलेलेच असतात. आता ते फक्त घट्ट गुंडाळले जाऊन x च्या आकारासारखे दिसायला लागतात.

आता पेशीमधला न्यूक्लियस तर अदृश्यच होऊन जातो. आता दोन सेंट्रोसोम नावाचे पेशी अंगकं विभाजित होऊन दोन सेंट्रिओल बनतात आणि पेशीच्या दोन टोकांकडे जातात.आणि त्यांतून पातळ नळ्यांसारख्या मायक्रोट्यूब्यूल्स येतात आणि त्यांच्यात मायक्रोट्यूब्यूल्सच्या स्पिंडल तयार करतात. (स्पिंडल म्हणजे चरख्याची चाती किंवा दोऱ्याच्या भिंगरीसारखी रचना.) आणि या क्रोमोसोम्सच्या मध्यबिंदूला (सेंटोमियरच्या कायनेटोकोअर्सना) जोडल्या जातात. गंमत म्हणजे या मायक्रोटयूब्यूल्स जेव्हा पेशी द्रवात पेशीला आकार देण्यासारखी इतर काम करत असतात तेव्हा त्यांना मायक्रोट्यूब्यूल्स म्हणतात आणि त्याच मायक्रोट्यूब्यूल्स आता जेव्हा पेशी विभाजनामध्ये क्रोमोसोम्सला जोडल्या जातात आणि त्यांना बांधल्या जातात तेव्हा त्यांना स्पिंडल्स किंवा स्पिंडल फायबर्स म्हणतात.

मेटाफेज

मेटाफेजमध्ये स्पिंडलच्या मायक्रोट्यूब्यूल्स क्रोमोसोम्सच्या केंद्रांना जोडल्या जाऊन क्रोमोसोम्सला पेशीच्या मध्यभागात ढकलतात.त्यामुळे आता मेटाफेजमध्ये सगळ्या क्रोमोसोम्सचे सेंटोमियर्स (म्हणजे क्रोमोसोम्सचा केंद्रबिंदू) पेशीच्या आडव्या अक्षावर येऊन स्थिरावतात.या अक्षाला मेटाफेज प्लेट किंवा इक्वेटोरियल प्लेट असं म्हणतात. ही रेषा त्या पेशीच्या मध्यभागी असते आणि पेशीच्या दोन टोकांना सेंटिओल असतात,त्यामुळे आता स्पिंडल फायबर्सच्या एका बाजूला सेंट्रिओल असतात आणि दुसऱ्या बाजूला क्रोमोसोम्स असतात.आणि आता मेटाफेजमध्ये हे क्रोमोसोम्स एकमेकांपासून लांब जाण्याच्या तयारीत असतात.

अ‍ॅनाफेज

अ‍ॅनाफेजमध्ये स्पिंडल फायबर्सला जोडले गेलेले क्रोमोसोम्स वेगळे होतात आणि ते x सारखे दिसण्याऐवजी सुटे होतात आणि (> च्या पेक्षा अधिक आणि च्यापेक्षा कमी या चिन्हांसारखे दिसतात.) थोडक्यात,ते उभ्या (वाय) अक्षावर तुटतात. क्रोमोसोमच्या अशा दोन भागांना सिस्टर क्रोमॅटिड्स म्हणतात.आता त्यांना जोडलेल्या स्पिंडल फायबरची लांबी कमी होते आणि प्रत्येक सिस्टर क्रोमॅटिड पेशीच्या दोन टोकांना जायला लागतात.सगळे क्रोमोसोम्स पेशीच्या दोन टोकांना गेले की अ‍ॅनाफेज संपली असं मानलं जातं.

टिलोफेज

आता पेशीच्या टोकाशी आलेल्या क्रोमोसोम्सच्या गुंडाळ्या पुन्हा सुट्या व्हायला लागतात आणि त्यांच्या भोवती नवीन न्यूक्लियस तयार होतो.

सायटोकायनॅसिस

यात पेशी द्रवाचंही विभाजन होतं आणि पेशीच्या मध्यातून पेशी आवरणाला क्लिव्हेज तयार होऊन दोन नवीन पेशी आवरणं तयार होतात आणि एका पेशीच्या दोन पेशी वेगळ्या होऊन पेशी विभाजन पूर्ण होतं.

मिऑसिस

मिऑसिस या पेशी विभाजनानं एका डिप्लॉइड (2n) पेशीचे चार हॅप्लॉइड (n) गॅमेट्समध्ये (म्हणजेच बीजांड किंवा शुक्रपेशी) रूपांतर होतं.गॅमेट्समध्ये मूळ पेशीच्या निम्मेच क्रोमोसोम्स असतात. मिऑसिस हे गोनॅड्समध्ये म्हणजेच प्रजननाच्या अवयवांमध्ये घडत असतं. पुरुषांमध्ये ते टेस्टीजमध्ये होतं आणि स्त्रियांमध्ये ते ओव्हरीजमध्ये होतं.गॅमेट्समध्ये निम्मेच क्रोमोसोम्स येण्यासाठी मिऑसिसमध्ये पेशी विभाजनाच्या चक्क दोन फेऱ्या व्हाव्या लागतात.या फेऱ्यांना मिऑसिस १ आणि मिऑसिस २ असं म्हणतात.मिऑसिस आणि मायटॉसिस या दोन्ही प्रक्रिया किंवा घटना दिसायला सारख्या दिसल्या तरी त्यांच्यात खूप महत्त्वाचे असे काही फरक असतात.
मायटॉसिसमधून दोन सारखे डिप्लॉइड पेशी तयार होतात,तर मिऑसिसमधून चार हॅप्लॉइड गॅमेट्स तयार होतात.

मायटॉसिस हे सेल सायकलच्या G1, S आणि G2 या फेजेस व्यवस्थित पार पडल्यानंतर होतं. S फेजमध्ये DNAचं रेप्लिकेशन होऊन त्याची अजून एक प्रत त्या पेशीमध्ये तयार होते.आता पेशीमध्ये DNA च्या दोन कॉपीज म्हणजे प्रती असतात. त्यांना सिस्टर क्रोमॅटिड्स म्हणतात.

आता ती पेशी मिऑसिस या फेजमध्ये प्रवेश करते. आणि सुरुवातीला पेशीच्या पेशी द्रवामध्ये सायटोप्लाझममध्ये असलेलं सेंट्रोसोम विभाजित होऊन दोन सेंट्रिओल्स तयार होतात आणि ते पेशीच्या दोन टोकांना जातात.त्यांना मायक्रोट्यूब्यूल्स जोडल्या जातात आणि मिऑटिक स्पिंडल तयार करतात.आता सिस्टर क्रोमॅटिइस संट्रोमियर्सला जोडलेल्याच असतात आणि आता त्या आकुंचित होतात आणि पेशी मिऑसिसच्या प्रोफेज १ मध्ये प्रवेश करते.

आता मिऑसिसमध्ये अशा दोन घटना घडतात की त्या मायटॉसिसमध्ये होत नाहीत आणि म्हणूनच मिऑसिसमध्ये जेनेटिक रीकॉम्बिनेशन घडतं आणि प्रत्येक वैशिष्ट्यासाठी वेगवेगळे जीन्स असलेले क्रोमोसोम्स प्रत्येक गॅमेट्समध्ये जातात.आणि म्हणूनच पालकांपेक्षा तर त्यांची मुलं वेगळी दिसतातच,पण आपल्या सख्ख्या भावंडांपेक्षाही ती वेगळी दिसतात ! त्यातली पहिली घटना ही प्रोफेज १ मध्ये घडते.त्यात होमोलॉगस क्रोमोसोम्स (एका जोडीचे) एकमेकांशेजारी येतात (सायनॅप्सिस) आणि ते चक्क आपल्या क्रोमॅटिइसच्या काही भागांची अदलाबदल करतात! यालाच क्रॉसिंग ओव्हर म्हणतात.त्यामुळेच जेनेटिक डायव्हर्सिटी वाढते.आणि आता न्यूक्लियसचं आवरण अदृश्य होतं आणि प्रोफेज संपते.

मेटाफेज १

आता सेंट्रिओल्समधून मिऑटिक स्पिंडलचे धागे ताणले जातात आणि ते क्रोमोसोम्समधल्या सिस्टर कोरमॅटिड्सना कायनॅटोकोअरद्वारे जोडले जातात. आता क्रॉसिंग ओव्हर झालेलं असल्यामुळे मिऑसिसमध्ये प्रत्येक क्रोमॅटिड वेगळा असतो,तोच मायटॉसिसमध्ये सारखा असतो.(क्रॉसिंग ओव्हर ही जेनेटिक रीकॉम्बिनेशन होण्यासाठी कारणीभूत ठरणारी मिऑसिसमध्ये होणारी पहिली घटना असते.) आता सगळे क्रोमॅटिड्स मेटाफेज प्लेटवर एका रांगेत येतात.

अ‍ॅनाफेज १

अ‍ॅनाफेज १ मध्ये होमोलॉगस क्रोमोसोम्स वेगळे होतात आणि पेशीच्या दोन टोकांकडे (ध्रुवांकडे) जायला लागतात. (ही जेनेटिक रीकॉम्बिनेशन होण्यासाठी कारणीभूत ठरणारी दुसरी घटना ठरते.) आणि त्यांच्याभोवती नवीन न्यूक्लियस तयार व्हायला सुरुवात होते.पुढे लगेचच क्लिव्हेज तयार व्हायला सुरुवात होते आणि सायटोकायनेसिस होऊन दोन पेशी वेगळ्या होतात.या दोन पेशींमधले क्रोमोसोम्स हे संख्येनं अर्धे असतात.पण तरीही त्यातले DNA मात्र अजूनही दुप्पट असते.तेही निम्मे करण्यासाठी मिऑसिस २ घडून येतं. मिऑसिस २ हे मायटॉसिससारखंच असतं.इथे दोन्ही पेशींमधले सेंट्रिओल्स पेशींच्या टोकाला जातात आणि पुढच्या गोष्टी घडतात. ( सजीव,अच्युत गोडबोले,
अमृता देशपांडे,मधुश्री पब्लिकेशन )

आता मिऑसिसमध्ये पुन्हा या दोन्ही पेशी DNA रेप्लिकेशनच्या दुसऱ्या फेरीसाठी तयार होतात आणि पुन्हा सेंट्रिओल्सही आपली एक प्रत तयार करतात आणि पेशीच्या टोकाशी जायला लागतात.

पुन्हा प्रोफेज २ मध्ये न्यूक्लियसचं आवरण अदृश्य होतं आणि मेटाफेज २ मध्ये पुन्हा स्पिंडलला जोडल्या गेलेल्या सिस्टर क्रोमॅटिड्स मेटाफेज प्लेटवर म्हणजेच पेशीच्या मध्यभागी येतात आणि अ‍ॅनाफेज २ मध्ये सिस्टर क्रोमॅटिड्स पुन्हा वेगळ्या होतात आणि पुन्हा पेशीच्या टोकाशी जायला लागतात.

टिलोफेज २

आणि शेवटची पायरी म्हणजे या टोकाशी आलेल्या क्रोमॅटिड्स पुन्हा गुंडाळी सुटायला लागते.आणि त्यांच्या भोवती न्यूक्लियस तयार होतं.आणि पुन्हा क्लिव्हेज आणि सायटोकायनेसिस होऊन दोन पेशी पुन्हा वेगळ्या होतात. या चार नव्या पेशी आता बीजांड पेशी किंवा शुक्रजंतूच्या पेशी असतात.

■ समाप्त ■

3/14/26

देणं - एक देणगी / Donate - a donation

तुम्हाला आपल्या जीवनातून खरोखरच जास्तीचं काही लाभायचं असेल तर त्याला एकच मार्ग आहे - तुम्ही आपल्या स्वतःमधून काही इतरांना देऊन टाकायचं.


जीवना विषयीचा वर्षभर धडा शिकत आम्ही जो एकत्र प्रवास केला,त्यात तरूण जेसन स्टीव्हन्सची प्रगती मला तर स्मिमित करून गेली.त्याला अजून खूप दूरवर जायचं होतं,पण इंग्रजीत म्हणतात तशागत, बोगद्याच्या शेवटाला मला उजेड दिसत होता.कॉन्फरन्स टेबलाशी या एकत्रित प्रवासातला आमचा नववा महिना सुरू करायला आम्ही बसलो होतो. जेसनच्या चर्चेमध्ये,प्रवृत्तीमधे आणि वर्तणुकीमधे आश्चर्यकारक बदल झाला होता.या महिन्यात त्याच्यासाठी रेड स्टीव्हन्सच्या खजिन्यात काय असेल बरं,याची तो उत्सुकतेने वाट बघत असावासा दिसला. मी तरी नक्कीच वाट बघत होतो.


रिमोट कंट्रोलवरची योग्य कळ मिस् हेस्टिंग्जनं दाबली आणि पुन्हा एकदा व्हिडिओच्या पडद्यावर रेड स्टीव्हन्स दिसला.


"स्वप्न बघणारा म्हणून घेतलेल्या परिक्षेत यशस्वी झाल्याबद्दल जेसन तुझे मी अभिनंदन करतो.या कलेत निपुण झाला,असं मात्र समजू नकोस.तू व्यक्ती म्हणून जसा वाढत राहशील,त्याबरोबर स्वप्न पाहण्याचं तुझं सामर्थ्य आणि ती स्वप्न सत्यात आणण्याची तुझी हातोटी वृद्धिंगत होत राहील.


"या महिन्यात देणं ही एक देणगी आहे याबद्दल तू शिकावस असं मला वाटतं.आपण काही महिन्यांपूर्वी ज्याबाबत बोललो तसं हे एक विरोधाभासी तत्त्व आहे.पारंपारिक शहाणपणानुसार जितकं तुम्ही कमी द्याल, तेवढं जास्त तुमच्यापाशी राहील.याच्या विरूद्धही सत्य आहे.जेवढं जास्त तुम्ही द्याल,तेवढं जास्त तुमच्यापाशी असेल.समृद्धी आली की देण्याचं सामर्थ्य वाढतं,देत राहिलं की समृद्धी आणखी वाढते.मला हे फक्त आर्थिक बाबतीत म्हणायचं नाहीये.तुमच्या आयुष्याच्या सर्व पैलूंबाबत हे लागू पडतं.


"दाता होणं आणि ग्राहक होणं दोन्ही महत्त्वाचं असतं. जेसन,या जगात आर्थिकदृष्ट्या तुमच्याजवळ असलेलं सर्व काही मी तुला दिलेलं आहे.पण देणं ही एक सच्ची देणगी ठरायची असेल तर वस्तू किंवा पैशाबरोबर देणाऱ्याचे हात द्यावे लागतात.तसं करण्यात मी कमी पडलो.सर्वोत्तम देणगी,जिम स्टोव्हॅल,स्वाधारित कलासामग्री,डॉन बिलिंग्ज,अनुवाद - दिशा केळकर

EMBASSY BOOK DISTRIBUTORS


स्वीकारतांना तुझी वृत्ती जणु तुझा तो हक्क आणि विशेषाधिकार आहे अशी होती,त्यात कृतज्ञतेची भावना नव्हती.माझ्याकडून होती.कोरडी कर्तव्यदक्षता, आपल्या दोघांच्या या वृत्तीमुळे देणं ही एक सच्ची देणगी असते,तिच्या आनंदाला आपण दोघंही मुकलो.


"तुम्ही जेव्हा कोणाला काही देता तेव्हा त्यामागची प्रवृत्ती योग्य असली पाहिजे,त्यामागे कोरडी कर्तव्यदक्षता नको.माझं अख्खं जीवन मी लोकांना द्यायला शिकलो.वस्तू देणं आणि आपला हिस्सा दुसऱ्या लोकांना देणं या आपल्या विशेषाधिकारापासून दूर राहण्याची मी कल्पनाच करू शकत नव्हतो.


"देण्यामधलं मुख्य तत्त्व म्हणजे जे द्यायचं ते मुद्दलात खास तुमचं असलं पाहिजे,तुमच्या कमाईचं किंवा तुम्ही बनवलेल किंवा चक्क तुमचा एक हिस्सा असलेलं.


"या महिन्यात मी तुला देणे ही की देणगी होते,याचा धडा देणार आहे.पण जर तू मी तुला दिलेले पैसे दिलेस, किंवा त्या पैशातून एखादी वस्तू घेऊन दिलीस तर ते तत्त्वाला सोडून होईल.म्हणून येते तीस दिवस तू रोज दुसऱ्याला तुझं असलेलं काहीतरी बक्षीस म्हणून द्यायचे आहेस."


जेसन ओठातल्या ओठात पुटपुटला,"माझं असं काहीच नाहीये."


रेडच्या आवाजाने त्याला मध्येच तोडलं."हं,मला कळतंय,तू बहुधा विचार करतोयस की आपलं स्वतःचं असं काय आहे की जे दुसऱ्याला देता येईल.दुसऱ्याला देता येतील,आणि त्या केवळ तुझ्याच असतील अशा गोष्टींचा शोध घेतलास की तुला देणं या देणगीच्या खजिन्याची किल्ली सापडेल.आणि पूर्वी कधी माहीत नसलेल्या एका आनंदाच्या राज्यात तुला सहजगत्या प्रवेश मिळेल.मी तुला ठेवलेली सर्वोत्तम देणगी मिळावी म्हणून तुला अशीच वाट चालत रहायची असेल,तर या महिन्याच्या शेवटी महिन्याच्या प्रत्येक दिवशी तू काय दिलंस त्याचा अहवाल तू मिस्टर हॅमिल्टनना द्यायचा आहेत.नेहमीप्रमाणे,मी तुला यश चिंतीतो." टेप संपली आणि जेसन किंचाळून बोलला,"रेड आजोबांनी दिलेलं नाही असं रोजच्या रोज देण्यासारखं माझ्याकडे आहे तरी काय? माझ्याकडे जे जे आहे ते सगळं त्यांनीच दिलेलं आहे."


मी मिनीटभर विचार केला आणि उत्तर दिलं,"पन्नास वर्षांहून जास्त काळ मी रेड स्टीव्हन्सला ओळखत होतो.तो कडक शिस्तीचा असला तरी न्यायप्रिय होता. तुला साध्य करून घेता न येण्यासारख्या गोष्टींची तो कधीच मागणी करणार नाही."


कॉन्फरन्स रूममधून जेसन हळूहळू चालत बाहेर पडला.तो कुठवर आला आहे याचा मी विचार केला, आणि आशा वाटली,की त्या टप्प्यावर प्रवास थांबणार नाही.पुढचा महिनाभर मी सारखा विचार करत होतो. ज्याला त्याच्याजवळच्या एकूणएक गोष्टी दुसऱ्या कोणी दिलेल्या आहेत,ती स्वतःची अशी असलेली गोष्ट कशी कोणाला देऊ शकेल ? मी अगदी मान्य करतो,काही गोष्टींची कल्पना करता करता माझी दमछक झाली. मला आशा वाटत होती की स्वतःची शक्कल लढवून जेसन नीट काही करत असेल.मला ठाऊक होतं की


माझा सर्वात जुना आणि सर्वात प्रिय असलेला, त्याच्याबाबत असलेली माझी कर्तव्याची जाणीव आणि माझी निष्ठा यामुळे या खेपेचं मूल्यांकन मी निःपक्षपातीपणाने,कर्तव्यबुद्धीने करणार होतो.


महिन्याच्या शेवटच्या दिवशी जेसन परतला.तो आणि मिस हेस्टिंग्ज माझ्या लिहिण्याच्या टेबलाशी माझ्यासामोर बसले.आम्ही परस्परांना औपचारिकपणे शुभेच्छा दिल्या.जेसन म्हणाला, "हे पहा,तुम्हाला मी सांगतो की माझ्याकडून मी अगदी शिकस्त केली.रेड आजोबांच्या मनात होतं त्याप्रमाणे माझी सगळी देणी होती की नाही,याची मला खात्री वाटत नाहीये.हे अगदी सोपं नव्हतं."


"मी हसलो आणि म्हणालो,"शिकण्याजोगा असतो तो कुठलाच घडा कधीच सोपा नसतो."


जेसननं एक कागद काढून उघडला आणि त्याचा अहवाल तो वाचायला लागला : "माझ्या स्वतःच्या असलेल्या तीस गोष्टी,ज्या मला दुसऱ्याला देता येतील अशा,की ज्या मला रेड आजोबांनी दिलेल्या नाहीत, अशांची जुळवाजुळव करणे फार कठीण होते.पण ते मी केलंय.


"पहिल्या दिवशी मी बाजारपेठेत गेलो आणि पहिल्या रांगेतच गाडी नेऊन उभी करायला मला जागा मिळाली. मी गाडीबाहेर पडत होतो,तेव्हा मला एक वयस्क जोडपं गाडी लावायला जागा शोधत असतांना दिसलं.मी माझी गाडी काढून त्यांना तिथे जागा करून दिली.आणि मी माझी गाडी मागे जाऊन उभी केली."


जेसननं माझ्याकडे संमतीच्या अपेक्षेने पाहिलं.मी नुसती मान हलवली आणि म्हटलं,"चालू दे पुढे."


"दुसऱ्या दिवशी मी ऐन गावात गेलो असतांना वादळ झालं.एका तरूण स्त्रीजवळ छत्री नव्हती.मी माझ्या छत्रीचा उपयोग तिच्याबरोबर केला.तिसऱ्या दिवशी मी रूग्णालयात जाऊन रक्तदान केले.चौथ्या दिवशी मी शेजाऱ्याला भेटलो.त्याला नवीन टायर्स विकत घ्यायचे होते.गावात जवळच खरोखर चांगला सेल लागला होता,त्याबद्दल मी त्याला सांगितले.पाचव्या दिवशी गाडीपर्यंत सामान न्यायला मी एका वृद्ध बाईला मदत केली.सहाव्या दिवशी माझ्या शेजारच्या बाईंना त्यांच्या मित्रमैत्रीणींबरोबर बाहेर जायचे होते.मी तेवढा वेळ त्यांच्या मुलांवर लक्ष ठेवले.सातव्या दिवशी मी अंधांच्या केंद्रावर गेलो आणि दृष्टी नसलेल्या विद्यार्थ्यांना काही लेख वाचून दाखवले.

आठव्या दिवशी मी एका खानावळीत जेवण वाढायला मदत केली.आणि नवव्या दिवशी एका मित्राला एक लहानसं टिपण आणि एक कविता करून पाठवली.


"दहाव्या दिवशी मी शेजाऱ्यांची मुले शाळेत पोचवायचे काम स्वीकारले.मिशनऱ्यांची समाजकार्य करणारी जी सालवेशन आर्मी ही संस्था असते.तिला देणगी मिळालेले सामान बांधाबांधी करून हलवायला मी मदद केली.अकरा,बारा आणि तेरा या दिवशी मी माझ्या घरात एका सांस्कृतिक विनिमयाच्या कार्यक्रमांतर्गत काही परदेशी विद्यार्थ्यांची उतरण्याची सोय केली. चौदाव्या दिवशी इथल्या स्काऊट पथकाची साप्ताहिक सभा घेण्यात मदत केली.पंधराव्या दिवशी मला दिसलं की एका माणसाची गाडी सुरू होत नव्हती कारण त्याची बॅटरी संपली होती.मग मी धक्का दिला.त्यामुळे गाडी सुरू झाली.सोळाव्या दिवशी रूग्णालयात असलेल्या असलेल्या बऱ्याच लोकांची मी पत्रे लिहिली. सतराव्या दिवशी मी इथल्या पांजरपोळास गेलो आणि तिथल्या काही कुत्र्यांना बागेत फिरवून आणले.वारंवार प्रवास केल्यामुळे मला विमान कंपनीने काही फुकट प्रवासाचे पासेस दिले होते.एका शाळेच्या बँड पथकाला कॅलिफोर्नियाला परेडसाठी जायचे होते.मी त्यांना ते पासेस दिले.एकोणिसाव्या दिवशी मी एका आश्रमात गेलो.तेथे अपंग आणि वृद्ध माणसांना जेवण देण्यात मदत केली.


"एका स्काऊटच्या लहान मुलांच्या पथकाला मी मासेमारी करायला आणि छावणीतल्या वास्तव्याला घेऊन गेलो.हे मी वीस,एकवीस,बावीस आणि तेवीस या दिवशी केलं. या आधी मासेमारी करायला किंवा छावणीमध्ये राहायला मी कधीच गेलो नव्हतो. चोविसाव्या दिवशी मी चर्चमध्ये जाऊन सदस्यांनी देऊन टाकलेल्या घरगुती वस्तूंची विक्री करण्यात मदत केली.पंचवीस आणि सव्वीस या दिवशी एक पथक जे हाबिटाट फॉर ह्युमॅनिटी (म्हणजे मनुष्य जातीसाठी निवासस्थाने) यासाठी काम करतात त्यांना मदत केली. सत्ताविसाव्या दिवशी एका धर्मादाय काम करणाऱ्या मंडळाला स्वागत समारंभ करण्यासाठी माझ्या घराचा वापर करू दिला.अठ्ठाविसाव्या दिवशी माझ्या शेजाऱ्याला त्याच्या आवारातला पालापाचोळा गोळा करायला मदत केली.

एकोणतिसाव्या दिवशी मी काय केलं माहिती आहे,बघा तुमचा विश्वास बसतो का, प्राथमिक शाळेचा बेकिंग सेल होता,तिथं बिस्किटं भाजायला मदत केली."


या टप्प्यावर जेसननं अहवाल वाचणं थांबवलं. एकोणतीस दिवस ज्यानं काही ना काही दिलंय त्यानं तिसाव्या दिवशी काहीच केल नाही असं काही माझ्या मनात येईना.शेवटी न रहावून मी विचारलं,"जेसन, तिसाव्या दिवसाचं काय ?"


जेसन हसून म्हणाला, "आज तिसावा दिवस आहे. आणि मी तुमच्यासाठी आणि मिस् हेस्टिंग्जसाठी काही बिस्किटं आणली आहेत.मी बेक सेल साठी घरी तयार केली ती."


जेसनच्या पायाशी एक पिशवी होती.इतका वेळ काही माझं तिच्याकडे लक्ष गेलं नव्हतं.तिच्यात त्यानं हात घातला आणि आम्हालां प्रत्येकाला थोडी बिस्किटं दिली.


जेसननं महिन्याभरासाठी नेमून दिलेलं काम पार पाडलेलं पाहून माझा जीव भांड्यात पडला.मी बिस्किटाचा एक तुकडा तोंडात टाकला आणि म्हणालो, "जमलंय बऱ्यापैकी,पण तुझ्या स्वप्नांमध्ये बेकींगचा समावेश नाही,ते एक बरं आहे."


आम्ही सर्वजण हसलो.आणि मग दुपारभर जेसन त्याला भेटलेल्या निरनिराळ्या माणसांबद्दल बोलत राहिला.महिनाभरात त्यानं त्याचं काय काय दिलं, याबाबत तो सांगत होता.एखादी छोटीशी गोष्ट जरी दिली,तरी घेणाऱ्याला ती किती महत्त्वाची देणगी होते याची मला आठवण झाली.


■■■ समाप्त ■■■

3/12/26

निर्जन वाळवंटात अस्तित्वाची लढाई / The battle for survival in the desert

रिकी मेगी वाळवंटातल्या नरकवासातून परतल्यावर ऑस्ट्रेलियात बराच गदारोळ झाला.त्याची हकीगत खरी की खोटी यावर वर्तमानपत्रांत चर्चा झडल्या.अशाच एका वर्तमानपत्रातील पत्रकार ग्रेग मॅक्लीन याने रिकीच्या सविस्तर मुलाखती घेऊन हे 'लेफ्ट फॉर डेड इन द आऊटबैंक' हे पुस्तक आकारालं आणलं.


अतिशय कमी झाला होता.त्यातच उन्हाचा तडाखा आता आधीपेक्षाही वाढलेला असतो.संध्याकाळी ऊन उतरल्यावर तो सलग एखादा किलोमीटर चालू शकत असतो पण दिवसा मात्र शंभर-दोनशे मीटर चालल्यावरही त्याला दम लागू लागतो.त्यात आपण कुठे चाललो आहोत याची कल्पना नसल्यामुळे ही पायपीट आणखीच अंगावर येत असते.तहानेने जीव जातो की काय अशी परिस्थिती तयार होते.आपण वेड्यासारखे पाणी सोडून आलो याबद्दल रिकी स्वतःलाच शिव्या देतो;पण दोन दिवस त्या स्थितीत काढल्यावर पुन्हा एकदा त्याला झाडांची गच्च दाटी लागते आणि त्यापल्याड आणखी एक पाणथळ रिकीची वाट पाहत असते.हाही बंधाराच असतो,पण आधीच्या बंधाऱ्यापेक्षा किती तरी मोठा.आता या बंधाऱ्यापाशी तरी माणसं असलीच पाहिजेत;अन्यथा,कोण कशाला एवढा बंधारा बांघेल,असा विचार करत रिकी स्वतःला पाण्यापाशी झोकून देतो.


थोड्याच वेळात या नव्या बंधाऱ्याच्या भोवतीही रिकीचं विश्व उभं राहू लागतं.तहान-भुकेची व्यवस्था लागल्यावर तो पुन्हा एकदा राहण्यासाठी नवं खोपटं बांधण्याच्या मागे लागतो.या वेळी त्याचं नशीब जोरावर असतं.त्या कुरणावर त्याला गाई-म्हशींना खाद्य द्यायला वापरलं जाणारं मोठं लोखंडी पिंप सापडतं.जमिनीत खड्डा करून त्यात ते पिंप आडवं घट्ट बसवल्यावर रिकीचं घर तयार होतं.शिवाय डास आणि पाऊस आत येऊ नये म्हणून नाना आयडिया लढवून तो ते घर फुलप्रूफ बनवतो.आणि सुरू होतो संघर्षाचा नवा टप्पा.


या घरामुळे लवकरच रिकीला आणखी एक शोध लागतो.त्या घरात फांद्यांची जाडजूड बिछायत घातली नाही तर उन्हामुळे तापलेल्या पत्र्यामुळे रिकीचं बूड शेकून निघत असतं.त्यावरून त्याला आपलं खाणं या पत्र्यावर ठेवून भाजून घेण्याची कल्पना सुचते.मग तर काय,आता खरंखुरं जेवण जेवल्याचा आनंद त्याला मिळू लागतो.या नव्या जागी रिकीच्या खाद्यपदार्थांमध्येही बरीच वाढ होते.नवे किडे,नव्या प्रकारच्या अळ्या,बेडकांच्या किती तरी जाती आणि पाली असा खुराक सुरू होतो.असेच दिवस जात राहतात.रिकीच्या घराच्या आसपास कुणीही फिरकत नाही.या वाळवंटात भरकटून त्याला आता दीड महिना उलटून गेलेला असतो.आपण आता कायमचे इथेच मुक्कामी असणार की काय असं रिकीला वाटू लागतं. दोन-तीन वेळा एक छोटं विमान त्याच्या डोक्यावरून अगदी जवळून उडत जातं.रिकीला वाटतं,पायलट आपल्याकडे पाहतो आहे;पण प्रत्यक्षात पुढे काहीच घडत नाही.

खाणं-पिणं,खोपटं आणखी सोईचं बनवण्यासाठी दिवसभर काहीबाही करत राहणं आणि उरलेला वेळ पाण्याकाठी किंवा खोपटात बसून विचार करत राहणं एवढंच रिकीच्या हातात असतं. आणखी एक काम त्याला सतत व्यापून असतं.वेळ मिळेल तेव्हा तो आग पेटवण्याचा प्रयत्न करून पाहत असतो.कधी दगड एकमेकांवर घासून,तर कधी लाकडं, तर कधी सूर्याच्या उष्णतेचा उपयोग करून.पण त्यात मात्र रिकीला काही केल्या यश मिळत नाही.त्या काळात त्याच्या मनात काय काय चालू राहतं.

आजवरच्या आयुष्यात घडून गेलेलं सारं पुन्हा अनुभवल्यासारखं समोर येतं.बालपणीच्या आठवणी,आई-वडील, बहिणी, मित्र-मैत्रिणी,आनंदाचे दिवस,केलेल्या चुका.. असं बरंच काही मनाशी घोळवत तो आला दिवस काढत असतो. अनेकदा त्याच्या मनात लिफ्टच्या बहाण्याने त्याला लुबाडणाऱ्या आणि इथे वाळवंटात आणून सोडणाऱ्या चोरट्यांचाही विचार येत असतो.तो विचार आला की त्याचं शरीर तापायला लागत असतं.इथून सुटलो की त्या लोकांना शोधून काढायचंच,असं तो स्वतःला बजावत असतो.पण आता त्याचा सगळा प्रयत्न सुटकेसाठी नव्हे,तर केवळ जिवंत राहण्यासाठी असतो. आरसा नसला तरी अनेकदा बंधाऱ्याच्या नितळ पाण्यात डोकावून बघताना त्याला स्वतःचं झपाट्याने खंगत चाललेलं शरीर दिसत असतं.उठता-बसता त्याला स्वतःचीच हाडं टोचू लागलेली असतात.शंभर किलोचा दणकट रिकी आता एक सांगडा बनून राहिलेला असतो.


काही दिवसांनी रिकीला एक मित्र मिळतो.ते एक वाळवंटी कुत्रं असतं.एक डोळा फुटलेलं कुत्रं.लवकरच रिकी त्या कुत्र्याशी गप्पा मारायला सुरुवात करतो. इतके दिवस ज्या गोष्टी तो स्वतःशी आणि त्या काठीशी बोलत असतो त्या सांगायला एक जिवंत प्राणी मिळतो.काही दिवसांनी पुन्हा दिवस पालटतात.पाऊस थांबतो आणि रिकीच्या अन्न-पाण्याचा साठा हळूहळू कमी होऊ लागतो. पाणी आणि प्राणी आणखी बरेच दिवस पुरतील अशी रिकीची खात्री असते;पण ते संपल्यावर काय,हा विचार त्याला अस्वस्थ करत असतो.त्याला मनातून जाणवू लागलेलं असतं,की आता यापुढे नव्याने मोहीम सुरू करण्याची शक्ती आपल्यात राहिलेली नाही. त्यामुळे तो अन्न आणि पाणी दोन्हीही जपून वापरायला सुरुवात करतो.मध्येच एकदा त्याच्या परिसरात काही छोटे इमू न जाणे कुठून पाण्याच्या शोधात भरकटत येतात.त्यांच्याकडे पाहिल्यावर रिकीचे डोळे चमकतात. एखाद्या इमूला जरी आपण मारू शकलो तर.. पण हे काम कोणत्या हत्याराने तडीस नेता येईल याचा विचार करेपर्यंत ते इमू सुसाट वेगाने आले तसे गायब होतात. एकदा एक कांगारूही त्याच्या जवळ येतो;


पण तोही हुलकावणी देऊन पळ काढतो.अर्थात,एवढे मोठे प्राणी मारण्याची ताकद आपल्यात राहिलेली नाही,हेही रिकीला मनातून माहिती असतंच.एकेक करून प्राणी संपत जातात.आसपासची हिरवळ आणि पाणीदार फुलंही खाऊन संपू लागतात.एवढंच काय,बंधाऱ्यातलं पाणीही कमी होत शेवाळ्याने भरलेल्या डबक्याचं रूप घेतं.एकाक्ष कुत्रा अजूनही रिकीच्या मागे मागे फिरत असतो.हा खरोखर आपल्याला मित्र मानतोय की आपण मरण्याची वाट बघतोय हे रिकीला कळेनासं होतं.कधी कधी त्याचीही मती फिरते.त्याला वाटतं,


आपल्याजवळच्या लोखंडी सळीने या कुत्र्याला मारावं आणि त्याला खावं;पण मित्र मानलेल्या कुत्र्याला मारायला काही केल्या रिकीचं मन धजत नाही.आणि एके दिवशी अचानक तो कुत्रा गायब होतो.त्याला कुणी मारलं की तो आपोआप मेला,की फक्त दुसरीकडे कुठे तरी भरकटत गेला ते रिकीला कळू शकत नाही.त्याच्या एकुलत्या एक सोबत्यानेही त्याची साथ सोडलेली असते.


आता आपली सुटका होईल का,हा विचार मनात आणणंही रिकीला नकोसं वाटतं.त्या विचाराने त्याचं आधीच निराश झालेलं मन आणखी गटांगळ्या खाऊ लागतं.एके सकाळी त्याला जाग येते तेव्हा कुत्र्यांच्या गुरगुरण्याचा आवाज ऐकू येतो.पाहतो तर चार-पाच दांडगट वाळवंटी कुत्रे त्याच्या खोपटाभोवती घिरट्या घालत असतात.गिधाडाने मरणाऱ्या प्राण्याची आशाळभूतपणे वाट पाहावी तसंच ते दृश्य असतं.हे आपलं घर नसून आपलं थडगं आहे,असं रिकी स्वतःशीच खूपदा म्हणत राहतो.त्या कुत्र्यांमुळे त्याचं खोपटातून बाहेर पडणं जवळपास बंद होऊन जातं.ते आसपास नाहीत असं बघून जवळचंच गवत तोंडात कोंबून आणि शेवाळलेलं पाणी पिऊन रिकी खोपटात पडून राहू लागतो.

आपल्यात आणि जंगलातल्या प्राण्यांमध्ये काहीच फरक नाही असं त्याला वाटू लागतं. त्या प्राण्यांना किमान त्रासाची जाणीव तरी नसते. आपलीही आता या त्रासातून सुटका झाली तर बरं, असा विचार त्याच्या मनात येऊ लागतो.आता मृत्यू सोडून आणखी काय वाईट घडू शकणार,असं वाटत असतानाच त्याला पुढचा फटका बसतो.


एके दिवशी रिकी उठतो तेव्हा त्याच्या चेहऱ्याची डावी बाजू सुजून ठणकत असते.रात्रीतून एखादा विषारी किडा आपल्याला चावला असावा असा अंदाज तो बांधतो.थोड्याच वेळात ते विष त्याच्या डाव्या हाताकडे पसरतं.आता आपण झोपून राहिलो तर कधी तरी ग्लानीतच आपल्याला मृत्यू येईल असं वाटून रिकी पडून राहतो;

पण किती तरी तास उलटतात,तरी ना मृत्यू येतो ना वेदना कमी होतात.आता तर त्याचा जबडा जवळपास बंद होतो.हाताने जोर धरून तो उचकटूनच त्याला तोंडात गवत कोंबावं लागत असतं.

गवत आत गेल्यावर तर मरणाच्या कळा सुरू होत असतात. त्याच्या लक्षात येतं,की आपल्याला विषारी किडा चावलेला नसून वेदना किडलेल्या दाढेमुळे होताहेत. खूप धीर एकवटून तो तोंडात बोट घालून खरोखरच कोणती दाढ दुखते आहे ते तपासतो.त्याचा अंदाज खरा असतो.ती दाढ काढून टाकली नाही तर काहीही खाणं अशक्य होऊन आपण मरणार हे त्याला कळून चुकतं. पण तसेही आपण कुठे जिवंत राहणार आहोत ? मग हातात काहीही साधन नसताना एवढी अघोरी शस्त्रक्रिया कशाला करायची,या उलटसुलट विचारांमध्ये आणखी दोन दिवस जातात.आता मात्र त्याला वेदना इतक्या असह्य होतात की आपल्या कारची किल्ली तोंडात घालून ती दाढ उपटण्याचा प्रयत्न तो सुरू करतो.सोबतीला वाकवता येतील अशा छोट्या ताराही असतात.आपण किती वेदना सहन करू शकतो हे आजवर आपल्याला माहितीच नव्हतं,असं रिकीला वाटून जातं.बऱ्याच प्रयत्नांनंतर आणि असह्य छळ सहन केल्यानंतर कित्येक किलोमीटरपर्यंत ऐकू जाईल एवढ्या किंकाळ्या फोडत तो दात उपटून काढण्यात रिकी यशस्वी होतो.


ही शस्त्रक्रिया झाल्यावरही किती तरी वेळ रिकीला काहीही तोंडात घालता येत नाही की उठून पाण्यापर्यंत जाता येत नाही.त्या खोपटात चार-पाच दिवस अडकून पडल्यानंतर रिकीला वाटतं,

आता पुन्हा एकदा बाहेर पडण्याचा प्रयत्न करायला हवा;पण त्याचे पाय एखाद्या जेलीसारखे निर्जीव झालेले असतात तो पायांवर उभाच राहू शकत नाही. कसा तरी लोळण घेत तो बंधाऱ्यातल्या पाण्यापर्यंत पोहोचतो.पुन्हा तसाच खोपटापर्यंत लोळत येतो. तिथेच पडून राहतो - मृत्यूची वाट बघत.त्यानंतर काहीच दिवसांत..अचानक रिकीला कारचा आवाज ऐकू येतो पण हा नक्कीच वाऱ्याचा आवाज असणार असं समजून तो त्याकडे दुर्लक्ष करतो. आपल्याला भास होणंही अवघड नाही हेही त्याला माहिती असतंच.पण थोड्याच वेळात त्याला गिअर बदलण्याचाही आवाज येतो.वारा काही गिअर बदलत नाही,असं म्हणत तो आपल्या खोपटातून बाहेर डोकावतो,तर काही अंतरावर खरोखरच एक गाडी उभी असते.त्यातली दोन माणसं कुतूहलाने रिकीच्या खोपटाकडेच पाहत असतात.रिकीचा आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसत नाही.तो जोरजोराने त्यांच्याकडे बघून हात हलवू लागतो,खोपटातून बाहेर येण्यासाठी धडपडतो.

खोपटात कोणी तरी असल्याचं पाहून त्या माणसांचा हात नकळत आपल्या बंदुकीवर जातो;पण तेवढ्यात रिकी उठून उभा राहण्यात यशस्वी होतो आणि हा माणूस असल्याचं त्यांना कळतं.तब्बल ७१ दिवस मृत्यूच्या दाढेत वावरल्यानंतर रिकी मेगीसाठी पुन्हा एकदा जीवनाचे दरवाजे उघडलेले असतात.


●●● समाप्त ●●●