जीवनात प्रत्येक माणूस दोन प्रवास करतो.
एक प्रवास जगाचा असतो आणि दुसरा स्वतःचा.
पहिल्या प्रवासात आपण माणसं भेटतो, अनुभव गोळा करतो, यश-अपयश स्वीकारतो आणि आयुष्य जगत राहतो. पण दुसरा प्रवास अधिक कठीण असतो. कारण त्या प्रवासात आपल्याला स्वतःलाच भेटायचं असतं.
माझ्या आयुष्यात हा आत्मशोध तीन गोष्टींनी घडवला—पुस्तकांनी, माणसांनी आणि अनुभवांनी.
पुस्तकांनी मला विचार करायला शिकवलं.
लेखनाने मला स्वतःशी संवाद साधायला शिकवलं.
मित्रांनी माझ्यावर विश्वास ठेवायला शिकवलं.
गुरूंनी शिस्त शिकवली.
संघर्षाने संयम दिला.
आणि काही निःस्वार्थ माणसांनी मला समजावलं की आयुष्याची खरी श्रीमंती पैशात नसते; ती जपलेल्या नात्यांत असते.
या भागातील प्रत्येक प्रकरण हे माझ्या आयुष्यातील एका व्यक्तीचं, एका अनुभवाचं किंवा एका जाणिवेचं स्मरण आहे.
ही यशाची कहाणी नाही.
ही स्वतःला घडवत जाणाऱ्या एका सामान्य माणसाची नोंद आहे.
या प्रवासात काही ठिकाणी पुस्तकांनी हात धरला.
काही ठिकाणी मित्रांनी.
काही ठिकाणी गुरूंनी.
आणि काही ठिकाणी पूर्णपणे अनोळखी असलेल्या माणसांनी.
आज मागे वळून पाहताना मला जाणवतं की माझ्या आयुष्याला आकार देणाऱ्या घटना फार मोठ्या नव्हत्या; पण त्या घडवणारी माणसं विलक्षण मोठी होती.
या भागात मी त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा प्रयत्न केला आहे.
कारण माझा ठाम विश्वास आहे—
माणूस स्वतःच्या कर्तृत्वाने उंचावतो; पण माणुसकीमुळे मोठा होतो.
या भागातील प्रत्येक पान हे त्या माणुसकीला वाहिलेलं एक नम्र अभिवादन आहे.
पुस्तकांनी मला वाचायला शिकवलं; लेखनाने मला स्वतःला
"पुस्तकं आपल्याला जग समजावून सांगतात; पण लेखन आपल्याला स्वतःशी ओळख करून देतं."
माणूस पुस्तक वाचायला लागतो, तेव्हा तो जगाला समजून घेऊ लागतो. पण जेव्हा तो लिहायला सुरुवात करतो, तेव्हा त्याचा खरा प्रवास सुरू होतो—स्वतःकडे जाण्याचा प्रवास.
माझ्या आयुष्यातही हे असंच घडलं.
लेखनाची सुरुवात माझ्या नियोजनातून झाली नाही; ती एका मित्राच्या विश्वासातून झाली.
परभणीचे माझे मित्र विष्णू गाडेकर पाटील यांनी मला ब्लॉग भेट दिला. ती केवळ तांत्रिक भेट नव्हती; ती माझ्या आयुष्यातील एका नव्या पर्वाची सुरुवात होती.
ब्लॉग हातात आला आणि मनात अनेक प्रश्न उभे राहिले.
मी काय लिहिणार?
माझं कोण वाचणार?
माझ्या शब्दांना खरंच काही अर्थ असेल का?
मी त्यांना शांतपणे एकच उत्तर दिलं—
"एक जरी वाचक मिळाला, तरी त्या एका वाचकासाठी मी आयुष्यभर लिहीन. आणि एकही वाचक मिळाला नाही, तरी मी स्वतःसाठी लिहीत राहीन."
आज त्या क्षणाकडे पाहताना जाणवतं की त्या वाक्यात माझ्या लेखनप्रवासाचं संपूर्ण तत्त्वज्ञान दडलं होतं.
हळूहळू लेख प्रकाशित होऊ लागले.
वाचक जोडले जाऊ लागले.
माझे विचार देशाच्या सीमा ओलांडून अनेक देशांपर्यंत पोहोचले. विविध भाषांमध्ये त्यांचे भाषांतर झाले. लाखो वाचकांपर्यंत माझे शब्द पोहोचले.
पण या प्रवासात मला सर्वांत मोठा आनंद आकड्यांचा कधीच वाटला नाही.
एखाद्या अनोळखी वाचकाने एवढंच लिहिलं—
"तुमचा लेख वाचून माझा विचार बदलला."
माझ्यासाठी तीच सर्वांत मोठी कमाई होती.
लेखनप्रवासात एक वेगळाच अनुभव आला.
वेबसाइट तयार करताना कळलं की www.vijaygaikawad.com हे नाव आधीच नोंदणीकृत आहे. ते नाव मला विकत घ्यावं लागलं.
त्या दिवशी प्रथमच जाणवलं—
ज्या नावाने आपण आयुष्यभर जगतो, तेही कधी कधी पुन्हा मिळवावं लागतं.
त्या अनुभवाने मला माझ्या ओळखीबद्दल नव्याने विचार करायला लावलं.
आपली खरी ओळख नावात नसते.
ती आपल्या कामात असते.
लेखनासाठीची खरी प्रेरणा मला पुस्तकांतून मिळाली.
एका पुस्तकातील एक साधं वाक्य माझ्या मनात कायमचं घर करून बसलं—
"जे आपल्याला माहीत आहे, ते दुसऱ्यांना द्यावं."
त्या दिवसानंतर लेखन माझ्यासाठी प्रसिद्धीचं साधन राहिलं नाही.
ते वाटण्याचं माध्यम बनलं.
मी जे शिकलो...
जे अनुभवलं...
जे पुस्तकांनी मला दिलं...
ते इतरांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू लागलो.
आजही माझा दिवस पहाटे चार वाजता सुरू होतो.
त्या शांत वेळेत मी लिहितो.
बाहेरचं जग अजून झोपलेलं असतं.
पण मन जागं असतं.
आणि शब्दही.
ते हळूहळू विचारांतून उतरतात आणि कागदावर स्वतःचं आयुष्य जगू लागतात.
माझ्यासाठी लेखन म्हणजे केवळ शब्दांची मांडणी नाही.
लेखन म्हणजे स्वतःशी प्रामाणिक राहण्याची प्रक्रिया.
स्वतःच्या विचारांची तपासणी.
स्वतःच्या चुका स्वीकारण्याचं धैर्य.
स्वतःच्या अहंकाराशी संवाद.
आणि दरवेळी स्वतःला थोडंसं अधिक चांगलं बनवण्याचा प्रयत्न.
लेखनाने मला एक अमूल्य धडा दिला—
"मी जर चांगला माणूस झालो, तर जगातून एक वाईट माणूस कमी झाल्याचं समाधान मला मिळेल."
हीच माझ्या लेखनाची दिशा आहे.
या प्रवासात वाचकांनी दिलेलं प्रेम ही माझी सर्वांत मोठी कमाई आहे.
परभणीचे सुभाष बाबाराव ढगे यांनी एकदा मला लिहिलं—
"दादा, आपण मला भेटलेला एक अनमोल हिरा आहात. ग्रंथांच्या सहवासातून तुम्ही स्वतःच एक कधी न संपणारा ग्रंथ झालात. आपल्या ध्येयवेड्या वाचनाने मी प्रेरित झालो आहे."
अशा प्रतिक्रिया आनंद देतात.
पण त्या जबाबदारीही वाढवतात.
कारण शब्द एकदा लिहिले की ते लेखकाचे राहत नाहीत.
ते वाचकांच्या आयुष्याचाही भाग बनतात.
म्हणूनच मी आजही लिहितो.
प्रसिद्ध होण्यासाठी नाही.
टाळ्या मिळवण्यासाठी नाही.
तर स्वतःला अधिक सजग...
अधिक संवेदनशील...
आणि कालपेक्षा आज अधिक चांगला माणूस बनवण्यासाठी.
आज मला वाटतं—
पुस्तकांनी मला वाचायला शिकवलं.
लेखनाने मला स्वतःला वाचायला शिकवलं.
आणि हा आत्मशोधच माझ्या आयुष्यातील सर्वांत मोठा प्रवास ठरला.
पुढील प्रकरणात मी अशा एका मित्राबद्दल सांगणार आहे, ज्याने मला उत्तरं दिली नाहीत; पण स्वतःला शोधण्याचे प्रश्न दिले. त्या मैत्रीने माझ्या आयुष्याचा विचारविश्व कायमचं बदलून टाकलं.
सॉक्रेटिस आणि मैत्रीचं विश्व.
"काही मित्र आपल्याला साथ देतात; पण काही मित्र आपल्याला स्वतःचाच शोध घ्यायला शिकवतात."
लेखनाने मला स्वतःशी संवाद साधायला शिकवलं.
पण त्या संवादाला दिशा देणारी काही माणसं आयुष्यात भेटली.
त्यापैकी सर्वांत महत्त्वाचं नाव म्हणजे परभणी जिल्ह्यातील चाटोरी गावचे माधव लिंबाजीराव गव्हाणे.
मी त्यांना त्यांच्या नावाने कमी आणि "सॉक्रेटिस" या नावानेच अधिक ओळखतो.
प्राचीन ग्रीसमधील सॉक्रेटिस प्रश्न विचारून माणसाला विचार करायला शिकवत असे.
माधव गव्हाणे यांनीही माझ्यासोबत तेच केलं.
त्यांनी मला तयार उत्तरं दिली नाहीत.
त्यांनी मला माझ्याच विचारांसमोर उभं केलं.
आमची मैत्री एका साध्या फोनपासून सुरू झाली.
राजर्षी शाहू महाराजांवरील त्यांचा वृत्तपत्रातील लेख वाचला आणि मी त्यांना फोन केला.
तो केवळ एक फोन नव्हता.
तो दोन विचारांना जोडणारा पहिला पूल होता.
त्या एका संवादातून पुढे जवळजवळ दोन वर्षांचा अखंड वैचारिक प्रवास सुरू झाला.
आम्ही पुस्तकांवर बोललो.
समाजावर बोललो.
जीवनावर बोललो.
अनेक विषयांवर मतभेद झाले.
पण मनभेद कधी झाले नाहीत.
या दोन वर्षांत एक गोष्ट विशेष होती.
आम्ही एकदाही प्रत्यक्ष भेटलो नव्हतो.
जेव्हा मी पहिल्यांदा त्यांना भेटायला निघालो, तेव्हा घरच्यांनी विचारलं,
"ओळख नसलेल्या माणसाकडे एवढ्या लांब कशाला जातोस?"
मी हसत एवढंच म्हणालो—
"मैत्री कधीच अनोळखी नसते."
मी चाटोरीला पोहोचलो.
ते समोर उभे होते.
मी पुढे गेलो आणि त्यांना घट्ट मिठी मारली.
आजही त्या क्षणाचा स्पर्श मनात ताजा आहे.
त्या दिवशी मी एका व्यक्तीला मिठी मारली नव्हती.
मी विश्वासाला मिठी मारली होती.
विचारांना मिठी मारली होती.
आणि आयुष्यभरासाठी जपल्या जाणाऱ्या मैत्रीला मिठी मारली होती.
माधव गव्हाणे यांनी मला केवळ एक मित्र दिला नाही.
त्यांनी मला माणसांचं एक विश्व दिलं.
त्यांच्यामुळे माझी ओळख दादासाहेब ताजणे, दादासाहेब गाडेकर, तात्यासाहेब गाडेकर, पार्थ गाडेकर, सचिन शिंदे आणि अनेक जिवाभावाच्या मित्रांशी झाली.
तेव्हा मला जाणवलं—
चांगल्या मित्राची खरी ओळख तो स्वतः किती मोठा आहे यात नसते; तर तो आपल्या आयुष्यात किती चांगली माणसं आणतो यात असते.
माधव गव्हाणे यांनी माझं पहिलं सार्वजनिक व्याख्यान सेलू येथे आयोजित केलं.
त्यांनी मला किशोर मासिकात लिहिण्यास प्रोत्साहन दिलं.
माझी प्रतिक्रिया छापून आली.
स्वतःचे शब्द पहिल्यांदा छापील अक्षरांत पाहताना जो आनंद झाला, तो आजही तितकाच जिवंत आहे.
एकदा त्यांनी मला एक वाक्य सांगितलं—
"तुम्ही जसे आहात तसेच सर्वश्रेष्ठ आहात."
हे वाक्य ऐकायला साधं वाटतं.
पण त्या एका वाक्याने मला स्वतःचा स्वीकार करायला शिकवलं.
माणूस दुसऱ्यासारखा होण्याचा प्रयत्न करत राहतो.
पण स्वतःसारखा होण्याचं धैर्य फार कमी लोकांकडे असतं.
माधव गव्हाणे यांनी ते धैर्य माझ्यात जागं केलं.
त्यांच्या मैत्रीतूनच माझ्या आयुष्यात आणखी एक अनमोल मित्र आला—
दादासाहेब ताजणे.
आमच्या प्रत्यक्ष भेटी फारशा झाल्या नव्हत्या.
पण खरी जवळीक भेटींच्या संख्येने ठरत नाही.
ती विश्वासाने ठरते.
एक काळ असा होता की माझी आर्थिक परिस्थिती अत्यंत कठीण होती.
धावताना माझे बूट पूर्णपणे फाटले होते.
नवीन बूट घ्यायचे होते.
पण हातात पैसे नव्हते.
संभापूर येथील माझे मित्र प्रताप भोसले यांच्याकडून मी तीन हजार रुपये उसने घेतले आणि बूट विकत घेतले.
हा प्रसंग मी सहजच दादासाहेब ताजणे यांना सांगितला.
थोड्याच वेळात त्यांचा फोन आला.
ते म्हणाले—
"साहेब, बूट घ्यायला तुम्ही उसने पैसे का घेतले?"
मी परिस्थिती सांगितली.
क्षणाचाही विलंब न करता ते म्हणाले—
"मी तुम्हाला तीन हजार रुपये पाठवतो. आधी प्रताप भोसले यांचे पैसे परत करा. आणि यापुढे तुमचे बूट फाटले, पुस्तक घ्यायचं असेल किंवा कोणत्याही चांगल्या कामासाठी पैसे लागले, तर थेट मला फोन करा."
त्या क्षणी मला फक्त तीन हजार रुपये मिळाले नव्हते.
मला माझ्या संघर्षात निःशब्दपणे उभा राहणारा मित्र मिळाला होता.
त्या दिवशी मला मैत्रीची एक नवीन व्याख्या समजली—
मित्र तुमच्या पायातील फाटलेले बूट पाहत नाही; तो तुमच्या स्वप्नांचा प्रवास थांबू देत नाही.
आज माझ्याकडे संपत्ती किती आहे, हा प्रश्न मला महत्त्वाचा वाटत नाही.
माझ्याकडे माधव गव्हाणे, दादासाहेब ताजणे आणि अशी असंख्य माणसं आहेत, हीच माझी खरी श्रीमंती आहे.
मी आयुष्यात असंख्य पुस्तकं विकत घेतली.
पण काही माणसांनी मला शिकवलं—
"पुस्तकं ज्ञान देतात; पण मित्र त्या ज्ञानाला जगण्याचं धैर्य देतात."
आज मागे वळून पाहताना मला जाणवतं—
मी चाटोरीला एका मित्राला भेटायला गेलो होतो.
परतताना अनेक मित्र...
अनेक नाती...
आणि स्वतःचं अधिक समृद्ध रूप घेऊन परतलो.
कारण माझ्या आयुष्यातील सर्वांत मोठा शोध पुस्तकांनी लावला नाही.
तो मैत्रीने लावला.
पुढील प्रकरणात अशा दोन गुरूंची गोष्ट आहे, ज्यांनी मला धावायला शिकवलं; पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे स्वतःवर विजय मिळवायला शिकवलं.
धावताना मला माझंच नवं रूप सापडलं.
"जीवनातील सर्वांत मोठी शर्यत इतरांशी नसते; ती कालच्या स्वतःशी असते."
प्रत्येक माणसाच्या आयुष्यात असा एक क्षण येतो, जेव्हा त्याला जाणवतं की बदलाची गरज बाहेरच्या जगाला नाही, तर स्वतःला आहे.
माझ्या आयुष्यात तो क्षण आला, जेव्हा माझं वजन १०४ किलो झालं होतं.
हे वजन फक्त शरीरावर नव्हतं.
ते माझ्या आत्मविश्वासावरही होतं.
चालताना दम लागायचा.
आरशात स्वतःकडे पाहताना अस्वस्थ वाटायचं.
धावणं ही गोष्ट माझ्यासारख्या माणसासाठी नाही, असंच मला वाटत होतं.
पण आयुष्य बदलणाऱ्या घटना अनेकदा एका साध्या संवादापासून सुरू होतात.
माझे जिवाभावाचे मित्र माधव गव्हाणे यांनी मला लुल्ला शेख यांचा दूरध्वनी क्रमांक दिला.
आमचं पहिल्यांदा बोलणं झालं.
त्यांच्या आवाजात आदेश नव्हता.
आपुलकी होती.
त्यांनी आहार, शिस्त, चालणं आणि धावणं याबद्दल प्रेमाने मार्गदर्शन केलं.
काही दिवसांनी त्यांनी त्यांचे गुरु नामदेव बरुरे यांच्याशी माझी ओळख करून दिली.
त्या दिवसापासून माझ्या आयुष्यात बदलाची खरी सुरुवात झाली.
अहमदपूरहून हे दोघे मला नियमित फोन करायचे.
मी काय खातो...
किती चालतो...
किती धावतो...
कोठे चुकतो...
याची ते प्रेमाने विचारपूस करायचे.
त्यांच्या शब्दांमध्ये नियंत्रण नव्हतं.
विश्वास होता.
आणि त्या विश्वासामुळे मी स्वतःवर विश्वास ठेवायला शिकलो.
पहिल्या दिवशी मी एक किलोमीटर धावलो.
नंतर दोन.
मग पाच.
मग दहा.
आणि एक दिवस...
मी सलग वीस किलोमीटर धावलो.
तो दिवस फक्त धावण्याचा विक्रम नव्हता.
तो माझ्या भीतीवर मिळवलेल्या पहिल्या विजयाचा दिवस होता.
काही दिवसांनी मी अहमदपूरला गेलो.
माझ्या गुरूंसोबत धावण्याची संधी मिळाली.
पण माझ्याकडे धावण्यासाठी योग्य बूट नव्हते.
लुल्ला शेख यांनी काहीही न बोलता स्वतःचे बूट काढले.
ते माझ्या पायात घातले.
आणि खाली वाकून त्यांच्या नाड्या स्वतः बांधल्या.
त्या क्षणी मला बूट मिळाले नव्हते.
मला गुरुंचं प्रेम मिळालं होतं.
माझे डोळे नकळत भरून आले.
त्या दिवशी मी वीस किलोमीटर धावलो.
पण माझ्या पावलांना बळ देणारे माझे गुरु होते.
एकदा पहाटे चार वाजता मी धावत होतो.
पोलिसांची गस्त सुरू होती.
त्यांनी मला थांबवलं आणि काळजीपोटी म्हणाले—
"साहेब, डांबरी रस्त्यावर धावू नका. गुडघ्यांना त्रास होईल."
मी नम्रपणे उत्तर दिलं—
"धन्यवाद साहेब; पण मेंदू बदलण्याचा खर्च गुडघे बदलण्याच्या खर्चापेक्षा खूप मोठा असतो."
हे वाक्य मी त्यांना सांगितलं.
पण खरं तर ते मी स्वतःलाच सांगत होतो.
या प्रवासात शरीर अनेकदा थकलं.
गुडघे दुखले.
श्वास अडखळला.
मनाने हार मानण्याचा सल्ला दिला.
पण मी थांबलो नाही.
कारण मी दुसऱ्या कोणाशी स्पर्धा करत नव्हतो.
मी कालच्या विजय गायकवाडला मागे टाकण्याचा प्रयत्न करत होतो.
आणि तो प्रयत्न आजही सुरू आहे.
लुल्ला शेख आणि नामदेव बरुरे हे माझ्यासाठी केवळ प्रशिक्षक नाहीत.
ते माझे गुरु आहेत.
गुरु म्हणजे फक्त कौशल्य शिकवणारा माणूस नव्हे.
गुरु म्हणजे आपल्या क्षमतेवर आपल्यापेक्षा जास्त विश्वास ठेवणारा माणूस.
या दोघांनी माझ्या आयुष्यात तेच केलं.
त्यांनी मला फक्त धावायला शिकवलं नाही.
त्यांनी मला स्वतःवर विजय मिळवायला शिकवलं.
पहिल्यांदा त्यांना प्रत्यक्ष भेटलो, तेव्हा औपचारिकतेचा लवलेशही नव्हता.
असं वाटलं, जणू आमची ओळख अनेक वर्षांची आहे.
त्या भेटीत शब्द कमी होते.
विश्वास अधिक होता.
या संपूर्ण प्रवासात माझी पत्नी सौ. मेघा माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली.
पहाटे उठून आहार तयार करणं...
वेळेवर जेवण देणं...
माझी काळजी घेणं...
आवश्यक प्रथिनांची व्यवस्था करणं...
आणि प्रत्येक टप्प्यावर माझा आत्मविश्वास वाढवत राहणं...
हे तिने कोणताही गाजावाजा न करता केलं.
आज मी मनापासून म्हणतो—
"ती आहे म्हणून मी आहे."
आज माझं वजन १०४ किलोवरून ७९ किलो झालं आहे.
पण माझ्या दृष्टीने हा आकड्यांचा प्रवास नाही.
हा आत्मविश्वासाचा प्रवास आहे.
धावण्याने माझं वजन कमी केलं.
पण त्याहून मोठी गोष्ट म्हणजे—
धावण्याने माझ्या मनातील भीती कमी केली.
शिस्त वाढवली.
आत्मविश्वास दिला.
आणि एक अमूल्य सत्य शिकवलं—
जीवनातील सर्वांत मोठी शर्यत मैदानावर नसते; ती आपल्या मनात सुरू असते.
आज मी कृतज्ञतेने एवढंच म्हणू शकतो—
पुस्तकांनी मला विचार दिले.
मित्रांनी मला आधार दिला.
गुरूंनी मला स्वतःवर विजय मिळवायला शिकवलं.
आणि धावण्याने मला माझंच एक नवीन रूप दाखवलं.
पुढील प्रकरणात मी त्या पुस्तकांविषयी सांगणार आहे, ज्यांनी माझ्या विचारविश्वाला दिशा दिली आणि मला "पुस्तकांतील दोन ओळींमधला प्रवासी" बनवलं.
पुस्तकांतील दोन ओळींमधला प्रवासी.
"पुस्तकं फक्त वाचायची नसतात; ती जगायची असतात. अनेकदा लेखकाने जे लिहिलेलं असतं त्यापेक्षा, जे न लिहिता वाचकावर सोडलं असतं, तिथेच सर्वांत मोठा विचार जन्म घेतो."
मी पुस्तकं वाचतो, तेव्हा फक्त अक्षरं वाचत नाही.
मी लेखकाच्या मनात प्रवेश करण्याचा प्रयत्न करतो.
म्हणूनच मी स्वतःला अनेकदा "पुस्तकांतील दोन ओळींमधल्या मोकळ्या जागेचा प्रवासी" म्हणतो.
कारण पुस्तकाचं खरं सौंदर्य अनेकदा शब्दांत नसतं.
ते शब्दांच्या मधल्या शांततेत असतं.
माझ्या आयुष्यात अनेक पुस्तकं आली.
काही वाचून संपली.
काही आठवणीत राहिली.
आणि काही पुस्तकांनी माझ्या विचारविश्वात कायमचं घर केलं.
परभणीचे माझे ज्येष्ठ बंधू मनोहर सुर्वे यांनी मला प्रथम हेन्री डेव्हिड थोरो यांच्या विचारांची ओळख करून दिली.
त्यांनी त्यांच्या संग्रहातील काही पाने मला पाठवली.
त्या काही पानांनी माझी उत्सुकता इतकी वाढवली की मी वॉल्डन विकत घेतलं.
आणि एका वेगळ्याच जगात प्रवेश केला.
थोरो यांनी मला निसर्ग दाखवला नाही.
त्यांनी निसर्ग समजायला शिकवलं.
जंगलात एखाद्या मृत प्राण्यावर तुटून पडलेली गिधाडं पाहिली की प्रथम मनात किळस निर्माण होते.
पण निसर्गाकडे शांतपणे पाहिलं, तर लक्षात येतं—
एका जीवाचा शेवट दुसऱ्या जीवाच्या जगण्याची सुरुवात असते.
निसर्ग निर्दयी नसतो.
तो समतोल राखत असतो.
या एका जाणिवेने माझ्या जीवनाकडे पाहण्याची दृष्टी बदलली.
थोरो यांनी मला आणखी एक महत्त्वाची गोष्ट शिकवली—
सकाळ घड्याळात उगवत नाही; ती मनात उगवते.
आज माझी पहाट चार वाजता सुरू होते.
पण मला वाटतं, पहाट वेळेमुळे येत नाही.
ती जागृतीमुळे येते.
झोपेतून उठणं सोपं असतं.
आळसातून उठणं कठीण असतं.
आणि त्या दुसऱ्या प्रवासाचं धैर्य मला पुस्तकांनी दिलं.
यानंतर माझ्या हातात आलं रिचर्ड डॉकिन्स यांचं देव नावाचा भ्रम (The God Delusion).
हे पुस्तक माझ्यासाठी श्रद्धेविरुद्ध नव्हतं.
ते प्रश्न विचारण्याच्या धैर्याबद्दल होतं.
या पुस्तकाने मला शिकवलं—
कोणतीही कल्पना...
कोणतीही परंपरा...
कोणताही विश्वास...
प्रश्नांच्या पलीकडे नसतो.
जिज्ञासा ही श्रद्धेची शत्रू नाही.
ती ज्ञानाची जननी आहे.
एक विचार माझ्या मनात कायमचा कोरला गेला—
"मी हे करू शकतो, हेच मला माहीत नव्हतं."
या एका वाक्याने मला माझ्या मर्यादांकडे नव्याने पाहायला शिकवलं.
आपल्या आयुष्यातील अनेक भिंती बाहेर उभ्या नसतात.
त्या आपल्या मनात उभ्या असतात.
आणि त्यांना पाडण्याची ताकद अनेकदा एका पुस्तकात दडलेली असते.
हळूहळू मला एक गोष्ट स्पष्ट झाली—
पुस्तकाला स्वतःचं मत नसतं; पण ते वाचकाला स्वतःचं मत तयार करण्याची क्षमता देतं.
म्हणूनच मी पुस्तक वाचताना लेखकाचा अनुयायी होत नाही.
मी त्याचा संवादसाथी बनतो.
माझ्यासाठी पुस्तक म्हणजे काळाशी केलेला संवाद आहे.
ज्या लेखकांना मी कधी भेटू शकत नाही, त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी पुस्तक मला देतं.
म्हणूनच मला वाटतं—
पुस्तक वाचणारा माणूस एका आयुष्यात अनेक आयुष्यं जगतो.
एकच पुस्तक दहा जणांनी वाचलं, तरी ती दहा वेगवेगळी पुस्तकं बनतात.
कारण प्रत्येक वाचक त्यात स्वतःचे अनुभव, प्रश्न आणि अर्थ घेऊन प्रवेश करतो.
पुस्तकांनी मला निरीक्षणाची दृष्टी दिली.
वारं दिसत नाही.
पण झाडाच्या शेंड्यावरून त्याची दिशा समजते.
तसंच जीवनातही अनेक सत्यं थेट दिसत नाहीत.
ती समजण्यासाठी डोळ्यांपेक्षा विचारांची दृष्टी आवश्यक असते.
ती दृष्टी मला पुस्तकांनी दिली.
पुस्तकांनी माझ्या दुःखाकडे पाहण्याची दृष्टीही बदलली.
पूर्वी मला वाटायचं, दुःख म्हणजे आयुष्याचा अडथळा.
आज वाटतं—
दुःख आणि सुख या घटना नसतात.
त्या आपल्या दृष्टिकोनाच्या व्याख्या असतात.
जेव्हा मी संकटातून गेलेल्या माणसांच्या जीवनकथा वाचल्या, तेव्हा माझं स्वतःचं दुःख लहान वाटू लागलं.
मला समजलं—
जीवनात सुख माणसाला आनंद देतं.
पण दुःख त्याला खोली देतं.
आज मागे वळून पाहताना जाणवतं—
मनोहर सुर्वे यांनी मला थोरो यांच्यापर्यंत नेलं.
थोरो यांनी मला निसर्गापर्यंत नेलं.
डॉकिन्स यांनी मला प्रश्न विचारायला शिकवलं.
आणि पुस्तकांनी मला माझ्यापर्यंत आणून सोडलं.
म्हणूनच आजही मी अभिमानाने म्हणतो—
"मी पुस्तकांतील दोन ओळींमधल्या मोकळ्या जागेचा प्रवासी आहे."
कारण माझा प्रवास अजून संपलेला नाही.
प्रत्येक नवीन पुस्तक मला पुन्हा एकदा स्वतःलाच नव्यानं भेटवून जातं.
पुढील प्रकरणात मी अशा नात्यांविषयी सांगणार आहे, ज्यांचा जन्म रक्ताच्या नात्यांत झाला नाही; पण ज्यांनी माझं आयुष्य कुटुंबापेक्षाही अधिक समृद्ध केलं.
रक्तापलीकडची नाती.
"रक्ताची नाती जन्म देतात; पण माणुसकीची नाती आयुष्याला अर्थ देतात."
पुस्तकांनी मला विचार दिले.
मित्रांनी मला आधार दिला.
गुरूंनी मला दिशा दिली.
पण काही माणसांनी मला शिकवलं की नात्यांची व्याख्या रक्ताने होत नाही; ती प्रेम, विश्वास आणि निःस्वार्थ सहवासाने घडते.
माझ्या आयुष्यात अशी अनेक माणसं आली, ज्यांच्याशी माझं कोणतंही रक्ताचं नातं नव्हतं.
तरीही त्यांनी माझ्या जीवनात अशी जागा निर्माण केली, जी शब्दांत मोजता येणार नाही.
या प्रकरणाची सुरुवात मी एका वेदनेपासून करतो.
आमच्या वैवाहिक आयुष्यातील सर्वांत मोठी वेदना म्हणजे अपत्यप्राप्तीचा दीर्घ प्रतीक्षाकाळ.
वर्षामागून वर्षे सरत गेली.
प्रत्येक वर्ष आशेने सुरू व्हायचं.
आणि शांत निराशेने संपायचं.
एक वर्ष...
पाच वर्ष...
दहा वर्ष...
पंधरा वर्ष...
आणि पाहता पाहता १९ वर्षे निघून गेली.
आम्हाला मुलगा हवा होता की मुलगी, हा प्रश्न कधीच नव्हता.
आम्हाला फक्त एकदा "आई" आणि "बाबा" म्हणून हाक ऐकायची होती.
या काळात अनेक तज्ज्ञ डॉक्टरांना भेटलो.
असंख्य तपासण्या झाल्या.
प्रत्येक वेळी उत्तर जवळजवळ सारखंच असायचं—
"तुम्हा दोघांमध्ये कोणताही वैद्यकीय दोष नाही. योग्य वेळी बाळ होईल."
मी प्रत्येक वेळी एकच प्रश्न विचारायचो—
"जर काहीच समस्या नाही, तर मग बाळ का होत नाही?"
या प्रश्नाचं समाधानकारक उत्तर कोणाकडेच नव्हतं.
शेवटी आम्हाला आयव्हीएफचा सल्ला देण्यात आला.
मन अधिकच गोंधळलं.
आणि अशाच काळात माझ्या आयुष्यात एक बहीण आली.
ती जन्माने नव्हे.
माणुसकीने.
त्या बहिणीचं नाव—
जयश्रीताई दिलीप शिंदे.
दिवसभर बाजारात कष्टाची नोकरी करणारी ही साधी स्त्री आमच्या आयुष्यात आशेचा किरण बनून आली.
ती एवढंच म्हणाली—
"एकदा माझ्यावर विश्वास ठेवा. माझ्यासोबत चला."
त्या एका वाक्याने आम्ही तिच्यासोबत निघालो.
तिने आम्हाला बालिंगे येथील डॉ. अनिल कांबळे आणि डॉ. सौ. सविता कांबळे यांच्याकडे नेलं.
तेथून आमच्या आयुष्यातील एका नव्या अध्यायाची सुरुवात झाली.
त्यांच्या उपचारांमुळे आमच्या आयुष्यात आशेचा प्रकाश दिसू लागला.
ज्यासाठी आम्ही एकोणीस वर्षे वाट पाहिली होती, ते सुख काही महिन्यांत आमच्या दारात आलं.
१७ जून २०२५ रोजी सकाळी ६ वाजून ३२ मिनिटांनी मयानचा जन्म झाला.
त्या क्षणी आमच्या आयुष्यात फक्त एका बाळाचा जन्म झाला नव्हता.
आमच्या दीर्घ प्रतीक्षेचाही शेवट झाला होता.
पण प्रवास तिथे संपला नाही.
पुढील दहा दिवस आम्ही रुग्णालयात होतो.
या संपूर्ण काळात जयश्रीताई आमच्यासाठी केवळ बहीण नव्हत्या.
त्या आमच्या कुटुंबाचा आधारस्तंभ बनल्या.
दिवसभर स्वतःची नोकरी सांभाळून त्या संध्याकाळी रुग्णालयात यायच्या.
रात्रभर आमची काळजी घ्यायच्या.
आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा कामावर जायच्या.
हा क्रम त्यांनी सलग दहा दिवस कोणतीही अपेक्षा न ठेवता पाळला.
त्यांच्यासोबत श्रेया, श्रावणी, दुर्वा आणि दिलीपदादा यांनीही आम्हाला ज्या प्रेमाने साथ दिली, त्यामुळे ते आज आमच्या कुटुंबाचाच भाग झाले आहेत.
त्या दिवसापासून माझ्यासाठी "बहीण" या शब्दाचा अर्थ बदलला.
मला समजलं—
बहीण जन्मानेच मिळावी असं नाही; ती माणुसकीनेही मिळू शकते.
आज मी मनापासून म्हणू शकतो—
जयश्रीताई या माझ्या मानलेल्या बहिणी नाहीत.
त्या माझ्या आयुष्याने मला दिलेली सर्वांत सुंदर भेट आहेत.
या प्रवासाने मला आणखी एक गोष्ट शिकवली.
काही माणसं आपल्या आयुष्यात योग्य वेळी येतात.
त्यांचं येणं योगायोग वाटतं.
पण नंतर जाणवतं—
तो योगायोग नसतो.
तो आयुष्याने दिलेला आशीर्वाद असतो.
आज मयानकडे पाहताना मला त्याच्या जन्माइतकाच त्या प्रवासाचाही अभिमान वाटतो.
कारण त्याच्या जन्मकथेत औषधांचा वाटा आहे.
डॉक्टरांच्या ज्ञानाचा वाटा आहे.
पण त्याचबरोबर एका बहिणीच्या विश्वासाचाही मोठा वाटा आहे.
आणि म्हणूनच आज माझा विश्वास अधिक दृढ झाला आहे—
रक्ताची नाती आपल्याला जन्म देतात.
पण माणुसकीची नाती आपल्याला पुन्हा जन्म देतात.
पुढील प्रकरणात अशा माणसांविषयी सांगणार आहे, ज्यांनी कोणतंही रक्ताचं नातं नसतानाही माझं कुटुंब सतत मोठं करत नेलं आणि संकटाच्या प्रत्येक वळणावर माझा स्वाभिमान जपला.
प्रकरण ६ : रक्ताचं नातं नसतानाही माझं कुटुंब वाढत गेलं
"कुटुंब फक्त जन्माने मिळत नाही; ते विश्वास, माणुसकी आणि परस्परांच्या आधाराने आयुष्यभर घडत राहतं."
मयानच्या जन्मानंतर मला एक गोष्ट नव्याने समजली.
माणसाचं खरं कुटुंब कोणतं?
हा प्रश्न पूर्वीही मनात यायचा.
पण त्या दिवसांनंतर त्याचं उत्तर अनुभवातून मिळालं.
रक्ताची नाती आपल्याला जन्मतः मिळतात.
पण काही माणसं अशी भेटतात की ती रक्ताची नसतात, तरी हृदयात कायमची घर करून राहतात.
मयानच्या जन्मानंतर आम्ही दहा दिवस रुग्णालयात होतो.
त्या दिवसांत जयश्रीताई, श्रेया, श्रावणी, दुर्वा आणि दिलीपदादा यांनी आम्हाला जी साथ दिली, ती कोणत्याही नात्याच्या व्याख्येत बसणारी नव्हती.
ती माणुसकी होती.
त्या दहा दिवसांत मला जाणवलं—
माणूस संकटात असताना त्याच्या सभोवताली उभ्या राहणाऱ्या माणसांनीच त्याचं खरं कुटुंब तयार होतं.
त्या दिवसांनंतर माझ्या आयुष्यात आणखी एक आधार अधिक दृढ झाला—
दादासाहेब गाडेकर.
आजच्या काळात सामाजिक माध्यमांवर प्रत्येक जण चांगला दिसतो.
शब्दांत प्रेम व्यक्त करणं सोपं असतं.
पण संकटाच्या क्षणी निःशब्दपणे सोबत उभं राहणं, हीच माणुसकीची खरी परीक्षा असते.
दादासाहेब माझे नातेवाईक नाहीत.
आमच्यात कोणतंही रक्ताचं नातं नाही.
पण विश्वासाचं नातं आहे.
आणि अनेकदा तेच रक्ताच्या नात्यांपेक्षा अधिक दृढ असतं.
मयानच्या भविष्यासाठी मला पैशांची गरज होती.
मदत मागणं ही जगातील सर्वांत कठीण गोष्ट असते.
कारण मदत मागताना माणूस पैशांपेक्षा स्वतःचा स्वाभिमान जपण्याचा प्रयत्न करत असतो.
मी दादासाहेबांना माझी अडचण सांगितली.
त्यांनी एक क्षणही विचार केला नाही.
काही मिनिटांतच त्यांनी पन्नास हजार रुपये माझ्या खात्यावर पाठवले.
मी कृतज्ञतेने त्यांचे आभार मानले.
ते हसले आणि म्हणाले—
"आम्ही तुम्हाला मदत करत नाही. हे पैसे आम्ही तुम्हाला उसने देत आहोत."
त्या एका वाक्याने त्यांनी मला पैशांपेक्षा मोठी गोष्ट दिली.
माझा स्वाभिमान.
मदत करणं मोठं असतं.
पण मदत करताना समोरच्या माणसाचा स्वाभिमान जपणं त्याहून मोठं असतं.
त्या दिवशी मला जाणवलं—
माणुसकी म्हणजे दुसऱ्याच्या हातात पैसे ठेवणं नव्हे; त्याच्या मनातला आत्मविश्वास जिवंत ठेवणं.
आज मयान खेळताना दिसतो, तेव्हा त्याच्या भविष्याच्या प्रवासात दादासाहेबांसारख्या माणसांचाही वाटा आहे, ही जाणीव मला नम्र करून जाते.
माझ्या आयुष्याने मला एक मोठा धडा दिला आहे.
रक्ताची नाती जन्म देतात.
पण माणुसकीची नाती आयुष्य घडवतात.
या प्रवासात मला अनेकदा वाटलं—
देव माणसांच्या रूपानेच भेटत असावा.
कारण काही माणसं आपल्या आयुष्यात अगदी योग्य वेळी येतात.
त्यांच्या येण्याने समस्या संपत नाहीत.
पण त्या समस्यांना सामोरं जाण्याचं धैर्य नक्की वाढतं.
आज मी माझ्या आयुष्याकडे मागे वळून पाहतो, तेव्हा मला माझं वैभव पैशात दिसत नाही.
ते मला माणसांत दिसतं.
माझ्याकडे जपण्यासाठी काही नाती आहेत.
कृतज्ञ राहण्यासाठी काही चेहरे आहेत.
आणि संकटात निःशब्दपणे हात धरणारी काही माणसं आहेत.
हीच माझी खरी संपत्ती आहे.
कारण शेवटी माणूस घरांनी श्रीमंत होत नाही.
तो माणसांनी श्रीमंत होतो.
पुढील आणि या भागातील अंतिम प्रकरणात अशा मैत्रीविषयी सांगणार आहे, जिला वयाची मर्यादा नाही. काही नाती काळाच्या पलीकडे जातात आणि पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचतात.
प्रकरण ७ : मैत्रीचं वय नसतं
"खरी मैत्री वय, अंतर किंवा रक्ताची नाती पाहत नाही; ती फक्त मन ओळखते."
भागभर मी पुस्तकांविषयी लिहिलं.
माणसांविषयी लिहिलं.
गुरूंविषयी लिहिलं.
नात्यांविषयी लिहिलं.
पण या सर्व अनुभवांचा गाभा एकच आहे—
माणूस एकटा घडत नाही.
त्याला घडवण्यासाठी अनेक हात, अनेक शब्द आणि अनेक माणसं आयुष्यभर निःशब्दपणे काम करत असतात.
माझ्या आयुष्यात अशाच माणसांपैकी एक नाव म्हणजे तात्यासाहेब गाडेकर.
आमच्या वयात बरंच अंतर आहे.
समाजाच्या भाषेत ते माझ्यापेक्षा मोठे आहेत.
पण मैत्री वयाच्या मोजपट्टीने मोजता येत नाही.
ती मनाच्या जवळिकीने मोजली जाते.
म्हणूनच मी नेहमी म्हणतो—
"मैत्री कधी वृद्ध होत नाही."
तात्यासाहेबांमुळेच माझी ओळख त्यांच्या मुलगा पार्थ गाडेकर याच्याशी झाली.
आमच्यातही वयाचं अंतर आहे.
पण मनांची जवळीक वयापेक्षा मोठी असते.
एक दिवस मी पार्थला सहज म्हणालो—
"आज तुझ्या आणि माझ्या वयात जितकं अंतर आहे, तितकंच उद्या तुझ्या आणि मयानच्या वयात असेल."
मी पुढे त्याला एवढंच सांगितलं—
"आज मयान लहान आहे. त्याला मैत्री म्हणजे काय, हे अजून समजणार नाही. पण आयुष्यभर त्याला कधीही एकटं सोडू नकोस."
मी हे सहज बोललो होतो.
पण पार्थने त्या शब्दांना मनापासून स्वीकारलं.
काही दिवसांनी तो फक्त मयानला भेटण्यासाठी जवळपास पाचशे किलोमीटरचा प्रवास करून कोल्हापूरला आला.
दोन दिवस तो आमच्यासोबत राहिला.
मी त्याच्याकडे पाहत होतो.
आजच्या धावपळीच्या आणि स्वार्थी जगात अनेकांना शेजाऱ्याची चौकशी करायलाही वेळ नसतो.
आणि हा तरुण...
फक्त प्रेमापोटी...
फक्त आपुलकीपोटी...
फक्त एका नात्याच्या जपणुकीसाठी...
शेकडो किलोमीटरचा प्रवास करून आला.
त्या दिवशी मला पुन्हा एकदा जाणवलं—
अंतर किलोमीटरमध्ये मोजता येतं; पण आपुलकीचं अंतर कोणत्याही मोजमापात मावत नाही.
आज मयान अजून लहान आहे.
त्याला या सगळ्या माणसांची किंमत कदाचित आज समजणार नाही.
पण एक दिवस तो मोठा होईल.
तेव्हा त्याला समजेल—
त्याच्या जन्मापूर्वीच काही माणसांनी त्याच्यावर प्रेम करायला सुरुवात केली होती.
आज मी मागे वळून पाहतो, तेव्हा माझ्यासमोर अनेक चेहरे उभे राहतात.
विष्णू गाडेकर पाटील...
माधव गव्हाणे...
लुल्ला शेख...
नामदेव बरुरे...
जयश्रीताई शिंदे...
दादासाहेब ताजणे...
दादासाहेब गाडेकर...
तात्यासाहेब गाडेकर...
पार्थ...
आणि अशी असंख्य माणसं...
या प्रत्येकाने माझ्या आयुष्यात काहीतरी दिलं.
कोणी विचार दिला.
कोणी दिशा दिली.
कोणी आधार दिला.
कोणी विश्वास दिला.
आणि काहींनी न बोलताही प्रेम दिलं.
आज माझ्याकडे किती पैसा आहे, हा प्रश्न मला महत्त्वाचा वाटत नाही.
माझ्याकडे किती चांगली माणसं आहेत, हा प्रश्न मला अधिक महत्त्वाचा वाटतो.
कारण आयुष्याच्या शेवटी माणूस संपत्तीची मोजदाद करत नाही.
तो आठवणींची, नात्यांची आणि कृतज्ञतेची मोजदाद करतो.
या संपूर्ण प्रवासातून मला एक गोष्ट स्पष्ट समजली आहे—
पुस्तकांनी मला विचार दिले.
लेखनाने मला स्वतःला समजून घ्यायला शिकवलं.
मित्रांनी माझा हात धरला.
गुरूंनी माझी वाट दाखवली.
आणि माणुसकीने मला जगण्याचा अर्थ दिला.
यापेक्षा मोठी संपत्ती माझ्याकडे नाही.
आणि यापेक्षा मोठी संपत्ती मला कधीच नको.
हा भाग लिहिताना मी प्रत्येक व्यक्तीचं स्मरण कृतज्ञतेने केलं आहे.
कारण माझ्या आयुष्यात जे काही सुंदर घडलं, त्यामागे माझं एकट्याचं कर्तृत्व नाही.
त्या प्रत्येक सुंदर क्षणामागे कुणाचा तरी विश्वास आहे.
कुणाचं तरी प्रेम आहे.
कुणाचा तरी निःशब्द हात आहे.
आणि म्हणूनच या भागाचा शेवट मी एका वाक्याने करतो—
"पुस्तकांनी मला विचार दिले; पण माणसांनी त्या विचारांना हृदय दिलं. म्हणूनच माझ्या आयुष्यातील सर्वांत मोठी संपत्ती म्हणजे मला भेटलेली माणसं."
भाग २ समाप्त
या भागात मी माझ्या आयुष्याला आकार देणाऱ्या पुस्तकांचा, मित्रांचा, गुरूंचा आणि रक्ताच्या नात्यांपलीकडे जाऊन माझं आयुष्य समृद्ध करणाऱ्या माणसांचा ऋणानुबंध मांडण्याचा प्रयत्न केला.
या प्रवासाने मला एकच सत्य शिकवलं—
माणूस मोठा त्याच्या यशामुळे होत नाही; तो मोठा त्याने जपलेल्या माणसांमुळे होतो.
आता पुढील भागात माझ्या जीवनप्रवासातील आणखी काही अनुभव, संघर्ष आणि नव्या जाणिवांचा प्रवास सुरू होईल.
क्रमशः…पुढील भागात भेटूया."