* विजय गायकवाड | Vijay Gaikawad

live

नमस्कार आपले स्वागत आहे. मी पुस्तके आणि मित्रांवर पैसे खर्च करतो,माझ्याकडे दगड आणि विटांवर खर्च करण्यासाठी पैसे नाहीत.- रस्किन बाँड.ही थोर माणसं व त्यांचे विचार मला पुस्तकात भेटलीत.ती भेटली आणि त्यांनी सांगितले कि, प्रत्येक दिवशी असं काही तरी करा की,ते तुम्हाला अधिक सुंदर उद्याच्या दिशेने खूप लांबवर घेऊन जाईल."- डोग फायरबाऊ.' सर्वियन कादंबरीकार मिलोराद पावीच यांचे एक वाक्य आहे ते म्हणतात - जोवर जगात पुस्तक वाचणाऱ्या वाचकांची संख्या बंदूकधारी सैनिका पेक्षा अधिक आहे तोवर काळजीच काहीच कारण नाही.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात.पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये.म्हणून अविरतपणे प्रयत्न करणारे मार्गदर्शक, मित्र धावून येतात.प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,डॉ.दीपक शेटे,आ.भरत बुटाले,प्रा.सर्जेराव राऊत,सुभाष ढगे,अनिल फारणे,डॉ.सुधीर सरवदे ,विश्वास खाडे, विनायक पाटील,संजय कुंभार,सतीश खाडे,मनोहर सुर्वे,गणेश खंदारे,तात्या गाडेकर, दादासाहेब गाडेकर, दादासाहेब ताजणे, पुस्तकातील घटना प्रसंग सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील यांनी केलेले आहे. मला लिहिण्याची प्रेरणा देणारी पुस्तके,लेखक,प्रकाशक,मित्र ही जगावेगळी माणसं माझ्या जीवनातील महत्वाचा टप्पा आहेत.... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ.मेघा गायकवाड, चिरंजीव मयान,माझ्या धावण्यातील गुरुवर्य नामदेव बरुरे,लुल्ला शेख मोठी ताई ,लहान ताई जयश्री शिंदे या सर्वांचेच मनापासून आभार व धन्यवाद मॅट्रिक फेल विजय गायकवाड

8/26/26

टॉर्कीमीडा व पवित्र ‘इन्क्विझिशन’ न्यायसंस्था Torquemada and the “Holy” Inquisition

मूळ ग्रंथ : मानवजातीची कथा — हेन्री थॉमस

अनुवाद : साने गुरुजी
प्रकाशक : मधुश्री पब्लिकेशन


भाग १ : इन्क्विझिशनच्या पार्श्वभूमीचा इतिहास

इन्क्विझिशन या संस्थेविषयी मी कदाचित पूर्वग्रहदूषित होऊन लिहीत आहे, असे कोणास वाटू नये म्हणून तिचे वर्णन मी तिच्या समर्थकांच्याच शब्दांत देणार आहे. या प्रकरणासाठी गोळा केलेली सारी माहिती रोमन कॅथॉलिक पुस्तकातून घेतली आहे. ज्यांनी ही संस्था सुरू केली, ज्यांनी तिचे भूतकाळात समर्थन केले व जे आजही एक ‘थिअरी’ किंवा ‘सिद्धांत’ म्हणून तिचे मंडन करू पाहत असतात, अशांच्याच दृष्टीतून मी या ‘इन्क्विझिशन’ संस्थेकडे पाहणार आहे.

ते पहिले आरंभीचे ख्रिश्चन लोक ख्रिस्ताच्या शिकवणुकीनुसार हरएक अत्याचाराच्या विरुद्ध होते. टरटूलियन म्हणे, “ख्रिश्चनांना लष्करात नोकरी करण्याचा हक्क नाही. धर्माची सक्ती करणे हे कोणत्याही धर्माचे काम नाही. धर्माचा स्वीकार मोकळेपणाने केला जावा. तो कधीही लादला जाऊ नये.”

ओरिजेन व लॅक्टॅन्टियस यांचीही मते अशीच होती. लॅक्टॅन्टियस लिहितो, “धर्म बळजबरीने लादता येणार नाही. अत्याचाराचे समर्थन कधीही करता येणार नाही.”

पण चौथ्या शतकात ख्रिश्चनांचा हृदयपालट होऊ लागला. ऑगस्टाइन म्हणे की, काही बाबतीत धर्मावर विश्वास न ठेवणाऱ्यास ठार मारणे योग्य आहे. ऑप्टेटस तर “जे जे नास्तिक असतील, त्या साऱ्यांना ठार मारलेच पाहिजे,” असे उघड उघड म्हणे. ऑगस्टाइन व ऑप्टेटस आज संत मानले जातात.

चौथ्या शतकापासून पुढे ख्रिश्चनांची सदय व सहिष्णू हृदये अदय व दुष्ट होऊ लागली आणि परधर्मीयांचा, म्हणजे ख्रिश्चन धर्मावर विश्वास न ठेवणाऱ्यांचा, छळ करायचा हे जणू ठरूनच गेले.

पण अकराव्या शतकापर्यंत खरा ख्रिश्चनपणा थोडा तरी शिल्लक होता; त्यानंतर मात्र ख्रिश्चन साधुता जणू पुरी लोप पावली! परधर्मीय किंवा अधिकृत रोमन कॅथॉलिक धर्मावर विश्वास न ठेवणारे यांची सर्रास होळी होऊ लागली. अशांचे प्रचंड प्रमाणावर भस्म होऊ लागले.

बाराव्या शतकात ही जिवंत जाळण्याची प्रथा अधिकच बळावली. लोकांना ही दुष्टता आवडू लागली. ११४० साली ग्रॅशियन याने असे आज्ञापत्र काढले की, नास्तिकता हा मरणार्ह गुन्हा आहे. क्रूसेडर्सना सांगण्यात आले की, जिथे जिथे परधर्मी दिसेल, तिथे तिथे त्याला ठार करा.

कॅथॉलिक इतिहासकार व्हॅकॅन्दार्ड लिहितो, “हे कत्तलीचे काम जे जे करीत त्यांना पोप क्षमापत्रे देत असे.”

तेरावे शतक तर ख्रिश्चन इतिहासकार, विशेषतः कॅथॉलिक इतिहासकार, फारच मोठे मानतात. अशा या महत्तम शतकातच पोप तिसरा इनोसन्ट झाला. त्याने बिशपांना आज्ञापत्र लिहिले, “जे जे रोमन कॅथॉलिक धर्म मानणार नाहीत, त्या सर्वांना बहिष्कृत करा. ‘या धर्मबहिष्कृततेच्या नरकात पडाल’ अशा शापाच्या आध्यात्मिक तलवारीने न भागले, तर खरी भौतिक तलवार उपसून तिचा उपयोग करा.”

१२०९ साली बेझेरिस येथे मोठी कत्तल झाली. कत्तल करणाऱ्यांनी अॅबट आर्नोल्ड याला विचारले, “हा रोमन कॅथॉलिक आहे की नाही हे आम्ही ओळखावे कसे?”

तो म्हणाला, “साऱ्यांचीच कत्तल करा. कोण कोणत्या धर्माचा हे देव पाहून घेईल.”

सहाव्या क्रूसेडचा नेता राजा दुसरा फ्रेडरिक होता. तो वरील अॅबटपेक्षा जरा सौम्य होता. त्याने आपल्या धार्मिक अनुयायांना सांगितले, “परधर्मीयांना जिवंत नका जाळू. फक्त त्यांच्या जिभा छाटा, उपटा.”


इन्क्विझिशनचा उदय

पण इन्क्विझिशन नामक जी प्रसिद्ध छळणारी न्यायसंस्था स्थापली गेली, तिचे सारे श्रेय पोप नववा ग्रेगरी याला आहे. १२३१ साली त्याने असा कायदा केला की, जे जे हट्टी विधर्मी असतील, त्यांना ठार मारलेच पाहिजे.

आपल्या नास्तिकपणाचा पश्चात्ताप होऊन जे कॅथॉलिक होतील त्यांना सोडून द्यावे, म्हणजे ठार मारू नये; पण जन्मभर तुरुंगात मात्र ठेवावे.

ग्रेगरीने आपल्या हाताखालच्या बिशप वगैरे सर्वांना पटवून दिले की, नास्तिकांना जिवंत जाळणे हे मुख्यतम कर्तव्य आहे. बिशपांनी या कर्तव्यात कला ओतली. या कर्तव्यात ते परम आनंद मानू लागले.

केवळ एका व्हेरोना शहरात एका महिन्यात त्यांनी साठ माणसे जिवंत जाळली!

बिशपांना असे कळविण्यात आले की, परधर्मी कोण, कॅथॉलिक मताचे कोण नाहीत, हे हुडकून काढण्यासाठी त्यांनी बातमीदार नेमावे. सामान्य कॅथॉलिकांपेक्षा ज्यांची-ज्यांची राहणी निराळी असे, त्यांच्या मरणयाद्या होऊ लागल्या.

याद्या आल्या म्हणजे बिशप त्यांची छाननी करून ज्यांना शिक्षा देणे योग्य त्यांना शिक्षा देत. जे बिशप भरपूर प्रमाणात नास्तिकांना जाळीत नसत, त्यांना पोप पदच्युत करी. कमीतकमी इतके तरी जाळले गेलेच पाहिजेत, असे ठरवून दिले जाई.

बिशपांनी या नास्तिकांना जरा दया दाखविली, तर त्यांच्यावरच नास्तिकपणाचा आरोप लादला जाऊन त्यांना तुरुंगात टाकण्यात येई.

अशा रीतीने पोप आपला नरमेध तेज राखी आणि ईश्वराचे वैभव वाढवी. ईश्वराचे वैभव वाढविता-वाढविता तो स्वतःही कुबेर बने. कारण जो जो जाळला जाई त्याची त्याची मालमत्ता चर्चच्या ताब्यात येई.

पण बिशप कितीही धर्मोत्कट असले, तरी ते पोपचे समाधान होण्याइतके रक्तपिपासू नव्हते. तद्वतच ते या वधकर्मात तितके वाकबगारही नव्हते.

ख्रिश्चनधर्मी युरोपातील सर्व पाप नाहीसे करण्यासाठी, सारे परधर्मीय निवडून त्यांचे निर्मूलन करण्यासाठी चांगले शिक्षण दिलेले गुप्त पोलिसांचे सैन्य उभारण्याची जरुरी होती. म्हणून पोपने डोमिनिक पंथीयांची मदत मागितली.

संत डॉमिनिक तलवारीने बाप्तिस्मा देण्याच्या मताचा अध्वर्यू; याचे अनुयायी कसे असतील हे सांगण्याची जरुरीच नाही. या डोमिनिक पंथीयांस धार्मिक दुष्टतेचे नीट शिक्षण देण्यात येत असे.

पोपने या शिक्षणाचा उपयोग करून घेण्याचे ठरविले आणि ‘इन्क्विझिशन’ नावाची अत्यंत प्रभावी व फायदेशीर संस्था उभी केली.

ग्रेगरीने डोमिनिकांना लिहिलेल्या पत्रांत त्यांच्या कर्तव्यांविषयी असा उल्लेख आहे—

“एखाद्या शहरात तुम्ही गेला म्हणजे तेथील बिशप, व क्लर्जी व लोक यांस एकत्र बोलवा; व त्यांना धर्मश्रद्धेवर एक गंभीर प्रवचन ऐकवा. नंतर तुमच्या न्यायासनासमोर आणल्या जाणाऱ्या संशयास्पद नास्तिकांची चौकशी करण्याच्या कामी शहरातील प्रतिष्ठितांचे साह्य घ्या.

चौकशीअंती अपराधी ठरतील त्यांना सांगा, ‘अतःपर चर्चची आज्ञा संपूर्णपणे बिनतक्रार मानली पाहिजे.’ जर ते नाकारतील, तर त्यांना योग्य ती शिक्षा द्या.”


इन्क्विझिशनच्या विरोधात उभे राहिलेले लोक

जे कॅथॉलिक धर्माचे नव्हते, जे पोपला नास्तिक वाटत, त्यांच्याविरुद्ध पोप इतका का उठला होता?

एक गोष्ट म्हणजे नास्तिकांना, कॅथॉलिक धर्म न मानणाऱ्यांना, पोपचे ते वैभव व त्याचा तो डामडौल पसंत नसे.

मध्ययुगातील ते ख्रिश्चन जणू समाजवादी होते! ते जणू तात्त्विक अराजकवादी होते! टॉलस्टॉय व इमर्सन यांचे जणू ते पूर्वदूत वा आध्यात्मिक पूर्वजच होते!

मध्ययुगात अशा लोकांचे नाना संघ होते व त्या सर्वांना एक गोष्ट समान होती; ख्रिस्ताच्या अहिंसक वृत्तीवर श्रद्धा.

धर्मोपदेशक व भटभिक्षुक यांची मयूरी त्यांना खपत नसे. ते म्हणत—

“ख्रिस्ताला जगात डोके टेकायला घरही नव्हते; पण हे पोप तर राजवाड्यात राहतात! ख्रिस्त ऐहिक सत्ता व संपत्ती तुच्छ मानी, तर हे पोप सत्तालोलुप आहेत! मानसन्मान व धनदौलत यांच्यासाठी हपापलेल्या या रोमन कॅथॉलिक धर्मगुरूत व ख्रिस्तात थोडे तरी साम्य आहे का?”

पुढच्या काळातील केकरांप्रमाणे हे कॅथॉलिक नसलेले लोक जोरजुलूमाच्या, तद्वतच द्वेष, देहान्त शासन, युद्धे यांच्याही विरुद्ध प्रचार करीत.

इतिहासकार व्हॅकॅन्दार्ड लिहितो—

“या लोकांच्या अशा क्रांतिकारक विचारसरणीमुळे ते केवळ कॅथॉलिक पंथाविरुद्ध होते; इतकेच नव्हे, तर देशद्रोही व समाजद्रोहीही होते. आणि या अशा शांतिदूतांना, या धोकेबाज लोकांना ठार मारण्यात चर्चची केवळ आत्मरक्षणाचीच दृष्टी होती. अशा लोकांच्या विचारांना वाटेल ती किंमत देऊन पायबंद घालणे जरूर होते.”

पण काय, हजारोंच्या प्राणांची किंमत?

‘होय’, हे इतिहासकार म्हणतात; व हे मत एखाद्या मध्ययुगीन धर्मोपदेशकाचे नसून अर्वाचीन काळातील कॅथॉलिक इतिहासकाराचे आहे, हे पाहून जरा गंमत वाटते.

इन्क्विझिशनची वृत्ती काही ठिकाणी अद्यापि जिवंत आहे तर एकूण!



8/24/26

पेशी आणि गर्भ — Cells and Embryo | भाग २

पेशी हे जीवनाचे एकक आहे, ही गोष्ट जीवशास्त्राच्या क्षेत्रातला उत्साह वाढवणारीच होती. पण या गोष्टीला आणखी पुष्टी देण्यासाठी एकच पेशी स्वतंत्रपणे जगू शकते आणि आपल्या सगळ्या गरजा पूर्ण करू शकते, हे दाखवून देण्याची गरज होती.

सजीव असण्यासाठी कोटी-कोटी पेशी मिळून संपूर्ण प्राणी तयार होणे आणि मग त्याला आपण सजीव प्राणी किंवा सजीव वनस्पती म्हणणे, हे गरजेचे नव्हते. सजीव जर अशा अनेक पेशींचे मिळूनच व्हायला लागले असते, तर पेशी हे जीवनाचे एकक नसून संपूर्ण प्राणी किंवा वनस्पतीच जीवनाचे एकक ठरले असते.

पण आता सेल थिअरीप्रमाणे पेशी हे पृथ्वीवरच्या कोणत्याही सजीवाचे एकक आहे, असे दाखवायचे असेल तर असा कोणता तरी जीव हवा ना, जो एकपेशीय असूनही स्वयंपूर्ण असेल.

मग असा सजीव शोधायचा कसा?

हीच गोष्ट जर्मन प्राणिशास्त्रज्ञ कार्ल थिओडोर अर्न्स्ट फॉन सीबोल्ड (Karl Theodor Ernst von Siebold, १८०४–१८८५) याने स्पष्ट करून दाखवली.

१८४५ साली सीबोल्डने तुलनात्मक शरीररचनेबद्दल (Comparative Anatomy) एक पुस्तक प्रकाशित केले. त्यात त्याने प्रोटोझुआ (Protozoa) बद्दल विस्तृत लिहिले होते.

अर्थात, प्रोटोझुआवर काम करणारा सीबोल्ड हा काही पहिलाच नव्हता. प्रोटोझुआ सर्वप्रथम लेव्हेनहूकने मायक्रोस्कोपखाली पाहिला होता. पण प्रोटोझुआ हा एकपेशीय सूक्ष्मजीव असला, तरी त्याची गणना स्वतंत्र सजीव म्हणून केली पाहिजे, हे सीबोल्डने स्पष्ट केले.

प्रत्येक प्रोटोझुआ पेशीच्या आवरणामध्ये बंदिस्त होता आणि त्याच्या आत जीवनासाठी आवश्यक अशा सगळ्या यंत्रणा होत्या.

ती एकच पेशी अन्न घेत होती, ते पचवत होती आणि टाकाऊ पदार्थ पेशीबाहेर टाकत होती. ती आपल्या सभोवतालच्या वातावरणाचा अंदाज घेत होती. प्रसंगी स्वतःला धोक्यापासून वाचवत होती. शिवाय तिची वाढ होत होती आणि ती चक्क प्रजननही करत होती.

गंमत म्हणजे, कोणताही एक प्रोटोझुआ हा बहुपेशीय प्राण्याच्या शरीरातील एका पेशीपेक्षा कितीतरी अधिक गुंतागुंतीची कामे करत होता.

पण त्यासाठी प्रोटोझुआला जिवंत राहण्यासाठी आवश्यक असलेली सगळी आयुधे आपल्या एकपेशीय शरीरामध्येच समाविष्ट करावी लागत होती. कारण बहुपेशीय प्राण्याच्या शरीरात हीच आयुधे वेगवेगळ्या पेशींमध्ये विभागलेली असतात.

एका स्वतंत्र पेशीचे महत्त्व दाखवून देण्यासाठी अनेकदा बहुपेशीय प्राण्यांचे उदाहरण दिले जात होते.

रशियन बायॉलॉजिस्ट कार्ल अर्न्स्ट फॉन बेअर (Karl Ernst von Baer, १७९२–१८७६) याने १८२७ साली सस्तन प्राण्याच्या अंडाशयातील ग्रॅफियन फॉलिकलमध्ये बीजांड असते, हे दाखवून दिले होते.

हा अभ्यास त्याने पुढेही चालू ठेवला आणि एका पेशीच्या बीजांडापासून संपूर्ण प्राणी कसा तयार होतो, याचा अभ्यास केला.

यानंतरच्या दशकांमध्ये त्याने बीजांड आणि त्यापासून होणारी गर्भाची वाढ याच विषयाचा सखोल अभ्यास केला. पुढे याच विषयावर दोन खंडांचे पुस्तक प्रकाशित केले. यातूनच त्याने एंब्रियॉलॉजी (Embryology) या विज्ञानशाखेचा पाया घातला आणि त्याचे पुस्तक पुढे या विषयाचे महत्त्वाचे पाठ्यपुस्तक ठरले.

यातून त्याने वूल्फची एपिजेनेसिसची थिअरी पुन्हा प्रकाशात आणली. वूल्फच्या या सिद्धान्ताला तो स्वतः हयात असताना व्यापक प्रसिद्धी मिळू शकली नव्हती.

बीजांडापासून वाढत जाणाऱ्या गर्भामध्ये सुरुवातीला सारख्या पेशींचे काही थर तयार होतात आणि मग या मूलभूत थरांपासून वेगवेगळे अवयव तयार होतात.

या थरांना पुढे जर्म लेयर्स (Germ Layers) असे म्हटले गेले.

हे जर्म लेयर्स नेमके किती असावेत आणि वेगवेगळ्या प्राण्यांमध्ये त्यांची संख्या वेगवेगळी होती की सारखीच, हे मात्र पुढील अभ्यासातून स्पष्ट झाले. एंडोडर्म (Endoderm), एक्टोडर्म (Ectoderm) आणि मेसोडर्म (Mesoderm) हे तीन प्रमुख गर्भस्तर ओळखले गेले.

स्विस डॉक्टर रुडॉल्फ अल्बर्ट फॉन कॉलिकर (Rudolf Albert von Kölliker, १८१७–१९०५) याने बीजांड आणि शुक्राणू हे स्वतंत्र पेशी आहेत, हे दाखवून दिले.

बीजांड आणि शुक्राणू एकत्र आल्यानंतर निर्माण होणारे फलित बीजही, म्हणजेच युग्मज (Zygote), एक स्वतंत्र पेशी असते, हेही स्पष्ट झाले.

पण गंमत म्हणजे बीजांड आणि शुक्राणू एकत्र येऊन फलनाची प्रक्रिया नेमकी कशी होते, हे कॉलिकरने प्रत्यक्ष पाहिले नव्हते. नंतर हर्मन फोल (Hermann Fol) याने स्टारफिशच्या बीजांडामध्ये शुक्राणू प्रवेश करून फलनाची प्रक्रिया कशी घडते, याचे प्रत्यक्ष निरीक्षण केले.

१८६१ मध्ये कॉलिकरने एंब्रियॉलॉजीबद्दल एक पुस्तक लिहिले. त्यात त्याने बेअरच्या एंब्रियॉलॉजीविषयक सिद्धान्तांचा सेल थिअरीच्या निकषांवर विचार केला.

सगळेच बहुपेशीय प्राणी सुरुवातीला एकपेशीय फलित युग्मजापासून आपले जीवन सुरू करतात. त्यानंतर त्या युग्मजाचे विभाजन सुरू होते.

या विभाजनाच्या सुरुवातीला तयार होणाऱ्या पेशी फारशा वेगळ्या नसतात. पुढे त्या वेगवेगळ्या प्रकारच्या पेशींमध्ये रूपांतरित होतात आणि त्यांच्यापासून संपूर्ण विकसित प्राणी तयार होतो.

हे पेशींच्या पातळीवर स्पष्ट केलेले एपिजेनेसिसच होते.

यानंतर रुडॉल्फ व्हर्चोने रोगग्रस्त ऊतींचा अभ्यास केला. त्यातून त्याने रोगग्रस्त आणि निरोगी अशा दोन्ही ऊतींना सेल थिअरी लागू पडते, हे दाखवून दिले.

रोगग्रस्त ऊतींमधील पेशीही आधीच्या पेशींपासूनच निर्माण झालेल्या असतात, हे त्याच्या अभ्यासातून स्पष्ट झाले. यातूनच पुढे पॅथॉलॉजी (Pathology) या जीवशास्त्राच्या महत्त्वाच्या शाखेचा विकास झाला.

या सगळ्या अभ्यासातून एक महत्त्वाची गोष्ट अधिकाधिक स्पष्ट होत गेली—

कोणतीही पेशी—ती रोगग्रस्त असो, निरोगी असो, स्वतंत्र एकपेशीय जीवाचा भाग असो किंवा बहुपेशीय प्राण्याच्या शरीराचा भाग असो—ती आधीच्या पेशीपासूनच निर्माण होते.

पेशींच्या पातळीवर सजीवांची एकरूपता आता बऱ्यापैकी स्वीकारली गेली होती आणि यावर सगळीकडे मोठ्या प्रमाणावर अभ्यास सुरू झाला होता.

फलित झालेलं जिराफाचं बीजांड, कुत्र्याचं बीजांड आणि माणसाचं बीजांड—ही सुरुवातीची रूपे आश्चर्यकारकरीत्या सारखी दिसतात. त्यांना आपण सहजपणे वेगळे ओळखू शकत नाही.

हळूहळू त्यांच्यामध्ये बदल होत जातात.

गर्भामध्ये सुरुवातीला सारख्या दिसणाऱ्या पेशी पुढे कधी माणसाच्या हाताचे पंजे बनतात, कधी पक्ष्याचा पंख बनतात, तर कधी एखाद्या प्राण्याचे पंजे बनतात.

याच पार्श्वभूमीवर प्राण्यांच्या दोन जातींमधले नाते तपासायचे असेल, तर संपूर्ण वाढ झालेल्या प्राण्यांचा अभ्यास करण्याऐवजी त्यांच्या गर्भावस्थेचा तुलनात्मक अभ्यास करणे अधिक योग्य ठरेल, असे बेअरला वाटत होते.

यातूनच कम्परेटिव्ह एंब्रियॉलॉजी (Comparative Embryology) या जीवशास्त्राच्या शाखेचा उगम झाला.

बेअरच्या अभ्यासातून पृष्ठवंशीय म्हणजेच व्हर्टिब्रेट (Vertebrate) गर्भाच्या सुरुवातीच्या अवस्थेत नोटोकॉर्ड (Notochord) असतो, हे स्पष्ट झाले. पुढे त्याची रचना पाठीच्या कण्याशी संबंधित संरचनेमध्ये विकसित होते.

याच पार्श्वभूमीवर रशियन प्राणिशास्त्रज्ञ अलेक्झांडर कोवालेवस्की (Alexander Kowalevsky, १८४०–१९०१) याने व्हर्टिब्रेट्स आणि इनव्हर्टिब्रेट्स यांच्यातील साम्य आणि फरकांचा अभ्यास केला.

या अभ्यासामुळे प्राण्यांच्या वर्गीकरणात कॉर्डाटा (Chordata) या संघाचे महत्त्व अधिक स्पष्ट झाले. या संघात पृष्ठवंशीयांसोबत काही अपृष्ठवंशीय प्राणीही समाविष्ट होतात.

आतापर्यंत जीवशास्त्रामध्ये झालेल्या प्रगतीमुळे ॲनाटॉमी (Anatomy), पॅलिओअॅनाटॉमी (Palaeoanatomy), बायोकेमिस्ट्री (Biochemistry), हिस्टॉलॉजी (Histology), सायटॉलॉजी (Cytology) आणि एंब्रियॉलॉजी (Embryology) या सर्वच विज्ञानशाखांनी उत्क्रांतीची आधी पुसटशी आणि नंतर अधिकाधिक स्पष्ट कल्पना दिली होती.

आता उत्क्रांती ही अटळ होती.

संपादकीय टीप

हा लेख सजीव— अच्युत गोडबोले आणि अमृता देशपांडे, मधुश्री पब्लिकेशन या पुस्तकातील संदर्भित मजकुरावर आधारित आहे. मूळ लेखकांना आणि प्रकाशकांना यथोचित श्रेय देणे आवश्यक आहे.

या संपादनात मूळ आशय, विचार आणि लेखनाचा प्रवाह कायम ठेवून शुद्धलेखन, विरामचिन्हे, परिच्छेदरचना, वैज्ञानिक संज्ञांची एकसंध मांडणी आणि वाचनसुलभता यांवर विशेष लक्ष दिले आहे.

विशेषतः ॲनाटॉमी, हिस्टॉलॉजी, सायटॉलॉजी, एंब्रियॉलॉजी यांसारख्या वैज्ञानिक संज्ञा तुटक न ठेवता सलग आणि प्रमाणबद्ध स्वरूपात मांडल्या आहेत.

काही वैज्ञानिक व ऐतिहासिक संदर्भांमध्ये अचूकता राखण्यासाठी आवश्यक तेथे संज्ञा आणि श्रेय यांची काळजीपूर्वक तपासणी केली आहे. मूळ लेखकाचा आशय बदलणे हा संपादनाचा उद्देश नाही; तो अधिक स्पष्ट, अचूक आणि वाचनीय करणे हाच उद्देश आहे.

📖 स्रोत :सजीव— अच्युत गोडबोले, अमृता देशपांडे | मधुश्री पब्लिकेशन

 

8/22/26

पेशी आणि गर्भ — Cells and Embryo | भाग १

सगळेच सजीव जवळपास सारख्याच घटक रसायनांनी—कार्बोहायड्रेट्स, लिपिड्स आणि प्रोटीन्स—बनलेले असतात, हे रसायनशास्त्रातले ज्ञान जीवशास्त्रज्ञांना समजल्यानंतर बायॉलॉजी आणि केमिस्ट्री यांच्यातला जवळचा संबंध लक्षात यायला वेळ लागला नाही.

त्यातून मायक्रोस्कोपच्या तंत्रात होत गेलेल्या प्रगतीने तर आतापर्यंत न दिसणाऱ्या गोष्टीही माणसाच्या दृष्टिक्षेपात आणल्या. त्यामुळे जीवशास्त्रातील रसायनशास्त्राचा अभ्यास आणखी सोपा झाला.

सुरुवातीला माणसाने माशी, केस, झाडाचे पान अशा आपल्या डोळ्यांना दिसणाऱ्या गोष्टी मायक्रोस्कोपमधून मोठ्या करून पाहिल्या. नंतर मात्र डोळ्यांना अजिबात न दिसणाऱ्या सूक्ष्म गोष्टींचा शोध घ्यायला त्याने सुरुवात केली.

गंमत म्हणजे मायक्रोस्कोपच्या शोधामुळे आणि त्यातून दिसणाऱ्या सूक्ष्मविश्वामुळे माणूस इतका भारावून गेला होता, की कधीकधी त्याने मायक्रोस्कोपमधून दिसणाऱ्या गोष्टींची अतिशयोक्तिपूर्ण वर्णने केली. एखाद्याने एखाद्या वेळी अशी वर्णने केली असती, तर ती फारशी टिकून राहिली नसती. पण अशी वर्णने अनेकांनी अनेकदा केल्यामुळे त्यावरून काही आडाखे बांधले गेले आणि चक्क काही सिद्धान्तही निर्माण झाले.

अर्थातच, हे सिद्धान्त खऱ्या विज्ञानापासून दूर होते. या चुका कशा घडल्या, त्या दुरुस्त करून माणूस पुन्हा योग्य मार्गावर कसा आला आणि आज आपण जाणतो त्या निष्कर्षांपर्यंत तो कसा पोहोचला, ही गोष्ट फारच मजेशीर आणि नाट्यमय आहे.

मायक्रोस्कोपिस्ट्सनी झाडांची पाने, त्वचा, माणसाचे केस, दातामागची जागा, गढूळ पाणी अशा अनेक गोष्टी मायक्रोस्कोपखाली तपासल्या होत्या. त्यातच माणसाचे वीर्यही होते. त्या वीर्यात त्यांना शुक्राणू पोहताना दिसले.

मग हे शुक्राणूच गर्भधारणेला कारणीभूत असावेत, असे वाटायला लागले.

आतापर्यंत बीमधून वृक्ष निर्माण होतो, अंड्यातून प्राण्याचे पिलू जन्माला येते, हे माणसाला माहीत होते. या पार्श्वभूमीवर शुक्राणूंचा शोध लागल्यामुळे प्रत्येक शुक्राणूमध्येही पूर्ण वाढ झालेलं, पण सूक्ष्म आकारातलं मूलच असावं, असं त्या काळच्या काही मायक्रोस्कोपिस्ट्सना वाटणं साहजिकच होतं.

कारण आधी न दिसणाऱ्या गोष्टी आता मोठ्या दिसत होत्या. मग मायक्रोस्कोपमधून दिसणाऱ्या गोष्टींच्या आतही त्यापेक्षा लहान गोष्टी असण्याची शक्यता कुणीही वर्तवली असती.

पण याचा सरळ अर्थ असा घेतला गेला, की कोणत्याही प्रजातीमध्ये भविष्यात निर्माण होणारे सर्व जीव आधीच एका बीजात सूक्ष्म स्वरूपात अस्तित्वात असतात.

त्यांना होम्यूनक्यूली (Homunculi) असे म्हटले जात होते. एका जीवाच्या आत दुसरा, त्याच्या आत आणखी एक, असे अनंत सूक्ष्म जीव असावेत, अशी कल्पना होती.

जर एखाद्या बीजांडात किंवा शुक्राणूमध्ये आधीच सूक्ष्म प्राणी किंवा माणूस असेल, तर तो जीव पुढे त्या शुक्राणूच्या किंवा बीजांडाच्या पुढच्या पिढीत जन्माला येईल आणि हे असंच अनंत पिढ्यांपर्यंत चालू राहील.

त्यामुळे आता अस्तित्वात असलेले, पूर्वी अस्तित्वात असलेले आणि भविष्यात जन्माला येणारे जीव आधीपासूनच अस्तित्वात असतात, असेही या कल्पनेतून मानले गेले.

यालाच प्रिफॉर्मेशन थिअरी (Preformation Theory) म्हणतात.

या सिद्धान्तानुसार कोणत्याही प्रजातीमधले सगळे जीव त्या प्रजातीच्या पहिल्या जीवातच अस्तित्वात असले पाहिजेत. आणि असे सगळे जीव सूक्ष्म स्वरूपात सुरुवातीपासूनच अस्तित्वात असतील, तर त्यांच्यामध्ये पुढच्या काही पिढ्यांतच काय, पण कधीच बदल होणे शक्य नव्हते.

पर्यायाने, प्रिफॉर्मेशनची कल्पना उत्क्रांतिवादालाच नाकारत होती.

पण ही कल्पना अस्तित्वात आली त्या वेळची परिस्थिती पाहता, त्या वैज्ञानिकांनी तार्किकदृष्ट्या असा विचार करणंही साहजिकच होतं.

या दृष्टिकोनावर पहिला घणाघाती हल्ला केला तो जर्मन डॉक्टर कास्पर फ्रेडरिक वूल्फ (Caspar Friedrich Wolff, १७३३–१७९४) याने. १७६९ च्या आसपास त्याने वनस्पतींच्या वाढीचा अभ्यास करताना काही महत्त्वाची निरीक्षणे केली.

वनस्पतीच्या वाढणाऱ्या शेंड्यामधल्या पेशी सुरुवातीला सारख्याच दिसणाऱ्या मूलपेशी असतात. नंतर वाढ होताना त्यांच्या कामांची विभागणी होते. तो टोक जसजसा वाढत जातो, तसतशा काही पेशी पुढे जाऊन पान बनतात, काही खोड बनतात, तर काही चक्क फूल बनतात.

पण सुरुवातीला मात्र त्या वनस्पतीच्या वाढणाऱ्या टोकावर असणाऱ्या या सगळ्या पेशी सारख्याच दिसतात.

आपली ही निरीक्षणे सादर करताना वूल्फ फक्त २६ वर्षांचा होता.

यानंतर त्याने आपला मोर्चा प्राण्यांकडे वळवला. त्यात त्याने अंड्यातल्या कोंबडीच्या पिलाचा अभ्यास केला. गर्भामध्ये सुरुवातीला सारख्या दिसणाऱ्या पेशी नंतर हळूहळू बदलत जाऊन वेगवेगळ्या अवयवांमध्ये रूपांतरित होतात, हेही वूल्फने दाखवून दिले.

यालाच एपिजेनेसिस (Epigenesis) म्हणतात.

याआधी विल्यम हार्वेनेही आपल्या १६५१ सालच्या पुस्तकात एपिजेनेसिसचा उल्लेख केला होता.

यावरून मग सगळेच सजीव बाहेरून कितीही वेगवेगळे दिसत असले, तरी त्यांची सुरुवात मात्र सारख्याच दिसणाऱ्या पेशींपासून कशी झाली असावी, याचा अभ्यास सुरू झाला.

याचाच अर्थ असा होता, की सजीव हे खूपच सूक्ष्म पण पूर्णपणे विकसित अशा लहान जीवांपासून होत नसून एकसारख्या दिसणाऱ्या साध्या पेशींपासून हळूहळू विकसित होतात.

फ्रेंच डॉक्टर मारी फ्राँस्वा झेवियर बिशा (Marie François Xavier Bichat, १७७१–१८०२) याने आपल्या शरीरातले वेगवेगळे अवयव वेगवेगळ्या प्रकारच्या पेशीसमूहांनी बनलेले असतात, हे मांडले. त्याने या वेगवेगळ्या पेशीसमूहांना ऊती (Tissues) असे नाव दिले.

इथूनच वेगवेगळ्या प्रकारच्या ऊतींचा अभ्यास करणारी हिस्टॉलॉजी (Histology) ही जीवशास्त्राची नवी शाखा विकसित झाली.

नंतरच्या अभ्यासातून लक्षात आले, की ऊतींचे अनेक प्रकार असले तरी प्राण्यांमध्ये त्या मुख्यतः एपिथेलियल, कनेक्टिव्ह, नर्व्ह आणि मसल अशा चार प्रमुख प्रकारांत विभागता येतात.

गंमत म्हणजे जवळपास सगळ्याच प्राण्यांमध्ये याच प्रकारच्या ऊती आढळतात.

प्रत्येक प्राणी वेगळा दिसत असला, तरी त्याच्या शरीराची मूलभूत पेशीय रचना आश्चर्यकारकरीत्या समान असते.

सतराव्या शतकाच्या मध्यात रॉबर्ट हुकने बुचाच्या झाडाच्या पातळ चकतीमध्ये cells म्हणजे पेशी पाहिल्या होत्या. त्या पेशी मोकळ्या दिसत होत्या. त्यांच्या आतमध्ये हुकला काहीही दिसले नाही, कारण त्या पेशी मृत होत्या.

नंतर अनेक लोकांनी जिवंत किंवा नुकत्याच मृत झालेल्या पेशी मायक्रोस्कोपखाली पाहिल्या. तेव्हा लक्षात आले, की पेशी रिकाम्या नसतात. त्या जेलीसारख्या द्रवाने भरलेल्या असतात आणि त्या द्रवामध्ये आणखी लहान लहान रचना असतात.

पेशींवर झेक वैज्ञानिक जोहानेस इव्हान्जेलिस्टा पुर्किन्ये (Johannes Evangelista Purkinje, १७८७–१८६९) यानेही काम केले. जिवंत बीजांडातील द्रवासाठी त्याने प्रोटोप्लाझम (Protoplasm) हा शब्द वापरला. पुढे जर्मन वनस्पतिशास्त्रज्ञ ह्यूगो फॉन मोहल (Hugo von Mohl, १८०५–१८७२) याने हा शब्द वनस्पतींच्या पेशींतील द्रवासाठी वापरला.

यानंतर पेशींवर भरपूर अभ्यास व्हायला लागला आणि प्रत्येक सजीवामध्ये पेशी सापडत गेल्या.

प्रत्येक सजीवामध्ये पेशी असतात, या निष्कर्षापर्यंत जीवशास्त्रज्ञ पोहोचत होते.

१८३८ मध्ये जर्मन वनस्पतिशास्त्रज्ञ मॅथियास याकोब श्लायडेन (Matthias Jakob Schleiden, १८०४–१८८१) याने वनस्पतींची ऊती पेशींनी बनलेल्या असतात, हे मांडले.

त्याच्या पुढच्याच वर्षी, म्हणजे १८३९ मध्ये, जर्मन शरीरशास्त्रज्ञ थिओडोर श्वान (Theodor Schwann, १८१०–१८८२) याने केवळ वनस्पतीच नव्हे, तर प्राणीही पेशींनी बनलेले असतात, हे मांडून श्लायडेनच्या कल्पनेचा विस्तार केला.

यातूनच सेल थिअरी (Cell Theory) या संकल्पनेचा पाया घातला गेला.

अर्थात, या संकल्पनेत पुढे अनेक वैज्ञानिकांनी भर घातली. त्यातून सायटॉलॉजी किंवा सेल बायॉलॉजी—म्हणजेच पेशीविज्ञान या जीवशास्त्राच्या नव्या शाखेचा उदय झाला.

रॉबर्ट हुक, लेव्हेनहूक आणि रॉबर्ट ब्राऊन यांसारख्या वैज्ञानिकांनी पेशींविषयी महत्त्वाची निरीक्षणे केली होती. रॉबर्ट ब्राऊनने पेशीतील केंद्रक (Nucleus) ओळखले. पण कोणत्याही सजीवाच्या जीवनाचे एकक असलेल्या पेशींचे मूलभूत गुणधर्म एकत्रितपणे स्पष्ट करणारी व्यापक संकल्पना नंतर विकसित झाली.

१८२४ मध्ये फ्रेंच वैज्ञानिक रेने जोआशिम हेन्री ड्यूट्रोशे (René Joachim Henri Dutrochet) याने पेशीविषयक महत्त्वपूर्ण कल्पना मांडली होती; मात्र तिला त्या वेळी व्यापक मान्यता मिळाली नाही.

नंतर रॉबर्ट रेमाक (Robert Remak) याने पेशी विभाजनातून नवीन पेशी निर्माण होतात याचे पुरावे दिले. पुढे रुडॉल्फ व्हर्चो (Rudolf Virchow) याने या कल्पनेला मोठी प्रसिद्धी दिली आणि रोगविज्ञानाच्या अभ्यासात तिचा प्रभावी वापर केला.

या सगळ्या प्रगतीतून एकोणिसाव्या शतकाच्या मध्यात सेल थिअरीचा पाया अधिक मजबूत झाला.

तिची मूलभूत तत्त्वे अशी होती:

प्रत्येक सजीव एक किंवा अनेक पेशींचा बनलेला असतो.

पेशी हे जीवनाचे मूलभूत एकक आहे.

नवीन पेशी आधीच्या पेशींपासून निर्माण होतात.

यापुढे सेल थिअरीने जीवशास्त्राचा चेहराच बदलून टाकला.


संपादकीय टीप

हा लेख ‘सजीव’ — अच्युत गोडबोले आणि अमृता देशपांडे, मधुश्री पब्लिकेशन या पुस्तकातील संदर्भित मजकुरावर आधारित आहे. मूळ लेखक आणि प्रकाशक यांना यथोचित श्रेय देणे आवश्यक आहे.

संपादनात भाषाशुद्धी, विरामचिन्हे, परिच्छेदरचना आणि वैज्ञानिक संज्ञांची सुसंगतता यांना प्राधान्य दिले आहे. काही ऐतिहासिक वैज्ञानिक संदर्भांमध्ये मूळ मजकुरातील कालक्रम किंवा श्रेय अधिक अचूक करण्यासाठी विश्वसनीय वैज्ञानिक संदर्भांचा आधार घेतला आहे. उदाहरणार्थ, आधुनिक सेल थिअरीतील “पेशी आधीच्या पेशींपासून निर्माण होतात” या तत्त्वाच्या विकासात रॉबर्ट रेमाक आणि रुडॉल्फ व्हर्चो या दोघांचे योगदान वेगवेगळ्या प्रकारे मानले जाते.

लेखकाचा मूळ विचार, आशय आणि प्रवाह कायम ठेवूनच संपादन करण्यात आले आहे. 🙏📖


8/20/26

अदृश्य पाचर — The Invisible Wedge | भाग २

उत्पादन आणि वापर यांच्यातील विसंवादात, फारकतीतच असा भ्रष्टाचार अनुस्यूत असतो. उत्पादित माल उत्पादकापासून ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी बाजाराची आवश्यकता निर्माण झाली, यातच मागे आपण पाहिलेल्या स्विचबोर्डची आणि तो चालविणाऱ्याची, म्हणजेच बेसुमार अधिकार धारण करणाऱ्या बाजाराचे संचालन करणाऱ्यांची विशिष्ट जागाही अवश्य निर्माण होणे गृहितच होते.

उत्पादन आणि वापर यांच्यातली फारकत हे दुसऱ्या लाटेचे व्यवच्छेदक लक्षण झाले. त्याने आपल्या मानसिक जीवनावर, आपल्या व्यक्तिमत्त्वविषयक कल्पनांवरदेखील खूप परिणाम केला. वागणूक म्हणजे व्यवहारांचा एक संच झाला.

एखादा समाज मैत्री, नाती किंवा जमातीच्या, सरंजामी निष्ठेवर उभारला जाण्याऐवजी, दुसऱ्या लाटेच्या ‘राज्या’त प्रत्यक्ष किंवा सूचित अशा करारबद्ध बंधनांवर आधारलेल्या संस्कृतीचा उदय झाला. आजचे पतिपत्नी देखील वैवाहिक कराराची गोष्ट करतात.

उत्पादक आणि ग्राहक यांच्या भूमिकांतील विसंवादामुळे दुहेरी व्यक्तिमत्त्व जन्माला आले. ज्या व्यक्तीला एक उत्पादक म्हणून कुटुंब, शाळा आणि वरिष्ठ यांनी संतोषाकडे पाठ फिरवायला, शिस्तप्रिय व्हायला, संयमी, नियंत्रित, आज्ञाधारक, संघातील एक घटक व्हायला शिकवले, त्याच व्यक्तीला त्याच वेळी एक ग्राहक म्हणून ताबडतोब संतुष्ट व्हायला, हिशोबी असण्याऐवजी तृप्त व्हायला, शिस्तीचा त्याग करायला, स्वतःच्या वैयक्तिक सुखाच्या मागे लागायला, म्हणजेच थोडक्यात असे की, अगदी वेगळी व्यक्ती बनायला शिकविण्यात आले!

विशेषतः पाश्चात्त्य राष्ट्रांत ग्राहकावर जाहिरातीचा जोरदार भडिमार करत राहून त्याला उधारीवर घ्यायला, एकदम मनाने उचल घेऊन खरेदी करायला, ‘आता उड्डाण करा, पैसे नंतर द्या’ अशा वृत्तीत पडायला भाग पाडले गेले; आणि वर अशी मखलाशी करून दाखवण्यात आली, की असे करण्यात तुमची राष्ट्रभक्तीच दिसून येते. कारण यायोगे तुम्ही राष्ट्राची अर्थव्यवस्था वेगाने चालू ठेवता व राष्ट्राचे कल्याण करता.

लैंगिक फाटाफूट

शेवटी, दुसरी लाट-समाजांमध्ये उत्पादक आणि ग्राहक यांच्यात ज्या प्रचंड पाचरीने फूट पाडली, त्याच पाचरीने आणखी सामाजिक फाटाफूट घडवून आणली. तिच्यामुळे कौटुंबिक जीवनावर, तसाच लैंगिक भूमिकांवर आणि माणसाच्या ‘अंतर्गत जीवना’वरही फार मोठा परिणाम झाला.

औद्योगिक समाजात प्रचलित असलेल्या लैंगिक विषयाबाबतच्या अनेक ठाम समजांपैकी एक म्हणजे संबंधात पुरुष हा वस्तुनिष्ठ असतो, तर स्त्री ही आत्मनिष्ठ असते. ह्यात जर काही तथ्यांश शोधायचा असेल, तर तो कदाचित काही पक्क्या जीवशास्त्रीय सत्यांत आढळणार नाही, तर या अदृश्य पाचरीने केलेल्या मनोवैज्ञानिक परिणामात आढळेल.

पहिल्या लाटेखालील समाजात बहुतेक काम शेतात किंवा घरात केले जात असे. संपूर्ण कुटुंब एकत्रितपणे, एखाद्या आर्थिक गटाप्रमाणे श्रम करीत असे आणि बहुतेक उत्पादन गावातच वापरले जात असे, किंवा जमीनदाराकडे त्यातील काही भाग पाठवला जात असे.

कौटुंबिक जीवन आणि कार्यान्वित जीवन (Work-life) एकमेकांत गुंफले गेले होते; जणू एकमेकांत विरघळून गेले होते. प्रत्येक खेडे बहुतांशी स्वयंपूर्ण असल्यामुळे दुसऱ्या खेड्यात काय घडते आहे, या गोष्टीवर ते कधीच अवलंबून नसे.

एका उत्पादक गटात बहुतेक कामगार कितीतरी प्रकारची कामे गरजेनुसार किंवा कोणाचे आजारपण उद्भवल्यास किंवा आवडीनेही करीत असत. औद्योगिक क्रांतीपूर्वी कामाची विभागणी अगदी प्राचीन स्वरूपाची होती. त्यामुळे पहिल्या लाटेच्या शेतीप्रधान समाजातील काम एकमेकांवर अवलंबून राहण्याच्या बाबतीत खालच्या पातळीवरचे असे.

ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी आणि इतर देशांमध्ये आलेल्या प्रचंड दुसऱ्या लाटेने काम शेत व घर या ठिकाणांतून उचलून कारखान्यात नेले आणि परस्परावलंबित्व खूपच वाढवून ठेवले.

आता कामासाठी सामूहिक प्रयत्न, कामाची विभागणी, मेळ, अनेक निरनिराळ्या कौशल्यांचे एकत्रीकरण या गोष्टींची गरज निर्माण झाली. दूरदूरच्या ठिकाणांहून आलेल्या, एकमेकांना ज्यांनी पूर्वी कधी पाहिलेही नसेल, अशा हजारो लोकांच्या काळजीपूर्वक आखलेल्या सहवर्तणुकीवर त्याचे यश अवलंबून राहू लागले.

एखाद्या विशिष्ट परिस्थितीमुळे एखादी मोठी पोलाद गिरणी किंवा काच कारखाना आवश्यक तेवढा मालाचा पुरवठा ऑटो प्लांटला करू शकला नाही, तर त्याचे दूरगामी परिणाम त्या संपूर्ण उद्योगावर आणि त्या भागाच्या अर्थकारणावर होऊ लागले.

परस्परावलंबित्वाच्या खालच्या व वरच्या पातळ्यांत झालेल्या टक्करीतून भूमिका, जबाबदाऱ्या आणि मिळणारा मोबदला यांच्या संदर्भात तीव्र संघर्ष निर्माण झाला.

उदाहरण द्यावयाचे झाल्यास, सुरुवातीच्या काळातील कारखानदारांच्या अशा तक्रारी होत्या, की त्यांचे कामगार कारखान्याच्या कार्यक्षमतेची पर्वा करत नाहीत. जेव्हा त्यांची अतिशय गरज असते, तेव्हा ते मासे मारायला जातात, अश्वक्रीडेत गुंग होतात किंवा दारू पिऊन येतात.

खरे पाहता, हे सुरुवातीच्या काळातले औद्योगिक कामगार ग्रामीण विभागातील परस्परावलंबित्वाच्या खालच्या पातळीची सवय असलेले होते. त्यांना संकीर्ण उत्पादन प्रक्रियेत आपली भूमिका काय आहे आणि आपल्या बेजबाबदार वृत्तीमुळे या प्रक्रियेत अपयश, खंड किंवा गैरव्यवस्था कशी निर्माण होते, याविषयीचे ज्ञान अगदी कमी होते किंवा अजिबात नव्हते.

त्यांच्यापैकी बहुतेकांना अगदीच केविलवाणे वेतन मिळत असल्याने त्यांना याबाबत काही काळजी किंवा विचार करण्याचे कारण नव्हते.

कामाच्या या दोन पद्धतींमधल्या झगड्यात कामाच्या नव्या पद्धतीचा जय होत गेला. अधिकाधिक काम व उत्पादन कारखाने व कचेऱ्यांकडे सोपवण्यात आले आणि ग्रामीण भागातील लोकसंख्या कमी कमी होत गेली.

लाखो कामगार उच्च परस्परावलंबी कामाच्या जाळ्याचे भाग बनून गेले. दुसऱ्या लाटेतील कामाने पहिल्या लाटेशी निगडित कामाच्या मागासलेल्या पद्धतीवर मात केली.

मात्र स्वावलंबित्वावर परस्परावलंबनाने मिळविलेला हा विजय तसा कधीच पूर्णत्वाला गेला नाही. एका ठिकाणी ही कामाची जुनी पद्धत हट्टाने जतन करण्यात आली. ते ठिकाण म्हणजे घर.

प्रत्येक घर म्हणजे जीवशास्त्रीय पुनरुत्पादन, म्हणजेच मुले जन्माला घालून ती वाढविणे आणि सांस्कृतिक प्रसारण या कामात मग्न असलेला विकेंद्रित कामगार गट होता.

परंतु जर एखादे कुटुंब मुलाला जन्म देऊ शकले नाही, किंवा जन्म दिलेल्या मुलांना चांगल्या तऱ्हेने वाढवू शकले नाही, कामगार म्हणून त्या मुलांना तयार करू शकले नाही, तरी त्या अपयशाचा परिणाम शेजारच्या कुटुंबाच्या या बाबतीतल्या यशावर होत होता असे नाही.

दुसऱ्या शब्दात सांगावयाचे म्हणजे, घर हे खालच्या पातळीवरील परस्परावलंबी कार्यक्षेत्रच राहिले.

नेहमीप्रमाणेच गृहिणी आर्थिक कामांबाबतचीही आपली महत्त्वपूर्ण कामे करत राहिली. ती ‘निर्मिती’ करत राहिली. परंतु तिचे उत्पादन विभाग ‘अ’ गटासाठीच होते. तिच्या स्वतःच्या कुटुंबाच्या उपयोगासाठी होते. बाजारासाठी नव्हते.

नवरा मोठ्या प्रमाणात प्रत्यक्ष आर्थिक उत्पादनाच्या कामासाठी दूर जात होता. बायको मात्र घरातच राहून अप्रत्यक्ष आर्थिक काम करत राहिली.

ऐतिहासिकदृष्ट्या अधिक प्रगत ठरलेल्या कार्यपद्धतीची जबाबदारी पुरुषाने स्वीकारली. स्त्री पूर्वीच्याच जुन्या, आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या कार्यपद्धती सांभाळत मागे राहिली.

तो जणू काही वेगाने भविष्याकडे निघाला होता, आणि ती भूतकाळातच राहिली.

ह्या विभागणीमुळे व्यक्तिमत्त्वात आणि अंतर्गत जीवनात फाटाफूट निर्माण झाली. कारखाना किंवा कचेरी यांच्या सार्वजनिक किंवा सामुदायिक स्वरूपाने परस्पर मेळ व ऐक्य यांची गरज निर्माण केली. तटस्थ विश्लेषणावर आणि वस्तुनिष्ठ नात्यांवर भर देण्यात येऊ लागला.

लहान असल्यापासूनच मुलांची तयारी दुकान वगैरे बाहेरच्या परस्परावलंबी जगात वावरण्याच्या दृष्टीने करण्यात येऊ लागली. पुरुष म्हणून त्यांना वस्तुनिष्ठ होण्याचे प्रोत्साहन देण्यात येऊ लागले.

तर जन्मापासूनच मुलींना प्रजोत्पादनाच्या, बालसंगोपनाच्या, घरकामाच्या दृष्टीने तयार करण्यात येऊन त्यांना काही प्रमाणात समाजापासून दूर ठेवण्यात येऊ लागले. त्यांना आत्मलक्षी होण्यास शिकवण्यात येऊ लागले आणि वस्तुनिष्ठतेसह येणाऱ्या बुद्धिनिष्ठ, विश्लेषणात्मक विचार करण्यास त्या असमर्थ आहेत असे समजण्यात येऊ लागले.

ज्या स्त्रियांनी या तुलनात्मक एकाकीपणाला न जुमानता, घरातच गुंतून न पडता स्वतंत्र उत्पादनात लक्ष घातले, त्यांना त्यांच्यातील स्त्रीत्व कमी झाले, त्या थंड झाल्या, कठोर झाल्या आणि तटस्थ, वस्तुनिष्ठ झाल्या असा बोल लावला गेला, यात आश्चर्य वाटण्याचे कारण नाही!

त्यातही गैरसमजुतीमुळे पुरुष उत्पादक म्हणून आणि स्त्री ग्राहक म्हणून ओळखली जाऊ लागली. वस्तुतः पुरुषही ग्राहक होते आणि स्त्रियाही उत्पादक होत्या.

यातून लैंगिक मतभेद, लैंगिक विषयाच्या रूढी अधिकाधिक तीव्र होत गेल्या.

दुसरी लाट पृथ्वीभर पसरण्याच्या कितीतरी पूर्वीच स्त्रिया दडपून टाकल्या जात होत्या; हे लिंगभेदावर आधारलेले आधुनिक युद्ध कामाच्या दोन पद्धतीतील युद्ध आहे. उत्पादन आणि वापर यांच्यामधील फारकतीतून ते निर्माण झालेले आहे.

अशा तऱ्हेची फुटीर अर्थव्यवस्था, लैंगिक फूट अधिकच खोल करीत राहिली.

आपण हे पाहिले, की एकदा एका ठिकाणी ठोकली गेलेली ही अदृश्य पाचर उत्पादकांपासून ग्राहकांना वेगळी करून चुकली. त्यामुळे अनेक बदल घडले. या दोन्हींचा दुवा म्हणून बाजाराची रचना करण्यात आली.

नवीन राजकीय व सामाजिक संघर्ष उद्भवले. नव्या लिंगविषयक भूमिका विचारात येऊन व्यवहारात आल्या.

परंतु या फुटीने आणखी देखील कितीतरी गोष्टी सूचित केल्या. तिचा असाही अर्थ झाला, की सर्व दुसरी लाट-समाजांनी एकाच तऱ्हेने काम करावे. त्यांना त्यांच्या काही मूलभूत गरजा पूर्ण करून मिळायला हव्यात. मग उत्पादनाचे उद्दिष्ट फायदा हे असो की नसो; उत्पादनाची साधने सार्वजनिक असोत की खाजगी असोत; बाजार खुला असो की नियोजनबद्ध असो; व्यवस्था समाजवादी असो किंवा भांडवलशाही—त्यात काही फरक पडणार नव्हता.

वापराऐवजी अदलाबदलीसाठी, देवाण-घेवाणीसाठीच उत्पादन केले जाईपर्यंत त्याला आर्थिक स्विचबोर्ड किंवा मार्केटकडेच जाऊन पोहोचणे भाग असे. दुसऱ्या लाटेची काही तत्त्वे अनुसरणे भागच होते.

ही तत्त्वे निश्चित ओळखल्यानंतर सर्व औद्योगिक समाजातील गुप्त चलनशक्तीची तत्त्वे उघड झाली. तरी आपल्याला दुसऱ्या लाटेच्या लोकांच्या विशिष्ट विचारसरणीची कल्पना करता येणे शक्य आहे.

कारण मूलभूत तत्त्वांच्या जोडीला ही तत्त्वे येऊन मिळाल्यानंतर दुसऱ्या लाटेच्या संस्कृतीची वर्तणूकसंहिता तयार झाली.

समाप्त


8/18/26

अदृश्य पाचर — The Invisible Wedge | भाग १

एखाद्या आण्विक प्रक्रियांच्या साखळीप्रमाणे स्फोटकपणे कार्य करीत दुसऱ्या लाटेने आजवर एक असलेली जीवनाची दोन अंगे फोडून बाजूला केली. असे करीत असताना तिने आपल्या अर्थकारणात, आपल्या मानसात, फार काय, आपल्या लैंगिक व्यक्तित्वातही एक फार मोठी अदृश्य पाचर ठोकून ठेवली.

औद्योगिक क्रांतीने एका अप्रतिमपणे एकसंध असलेला असा समाज आपल्या वैशिष्ट्यपूर्ण तंत्रज्ञानाद्वारे, आपल्या खास सामाजिक संस्थांद्वारे आणि आपल्या माहिती पद्धतींद्वारे कार्य करीत निर्माण केला. परंतु दुसऱ्या पातळीवर तिने आर्थिक तणाव, सामाजिक संघर्ष आणि मानसशास्त्रीय कासावीस यांनी ठासून भरलेली जीवनपद्धती निर्माण करून समाजाच्या अस्तरातील ऐक्य टरकावून बाजूला केले.

आपल्याला दुसऱ्या लाटेच्या युगामध्ये या अदृश्य पाचरीने आपले जीवन कसे घडवले हे समजले, की आकार घेत असलेल्या तिसऱ्या लाटेच्या आघाताच्या आवेगाचे आकलन होऊ शकेल.

मानवी जीवनाचे ह्या दुसऱ्या लाटेने केलेले दोन विभाग म्हणजे उत्पादन आणि वापर, विनियोग.

उदाहरणार्थ, आपल्याला नेहमी वाटत असते की आपण उत्पादक आहोत, तसेच ग्राहकही आहोत. परंतु नेहमी हे खरे असत नाही. औद्योगिक क्रांतीच्या अगोदर मानवाने निर्माण केलेले विपुल अन्नधान्य, तयार केलेल्या वस्तू आणि सेवा या गोष्टी खुद्द उत्पादक आणि त्यांच्या कुटुंबियांकडूनच वापरल्या जात होत्या किंवा श्रेष्ठ लोकांचा वर्ग या गोष्टींचा अवशेष स्वतःच्या वापरासाठी बळकावत असे.

बहुतेक शेतीप्रधान समाजात लोकांचा फार मोठा वर्ग शेती करत होता. छोट्या आणि काहीशा एकाकी गटांतून राहत होता. हे लोक गरजेपुरतेच अन्न निर्माण करत होते, स्वतःला जिवंत ठेवण्यात यश मिळवत होते. आपल्या जमीनदाराला खूश ठेवण्यातही यश मिळवत होते.

कितीतरी काळ अन्नधान्य साठवणीच्या सुविधा त्यांच्याकडे नव्हत्या. आपले उत्पादन बाजारापर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांच्याकडे रस्ते नव्हते. त्यांना माहीत होते की जास्त उत्पादन केले, तर सरंजामदार किंवा गुलामांचे मालक ते आपले हडप करतील. त्यामुळे आपले उत्पादनतंत्र सुधारण्याच्या किंवा उत्पादन वाढवण्याच्या बाबतीत ते उदासीन होते.

अर्थात् व्यापार तेव्हाही होता. आपल्याला माहीत आहेच, की काही धाडसी व्यापारी उंट, गाडी किंवा नौका यांच्यावर आपला माल लावून हजारो मैल तो नेत होते. ग्रामीण भागातून येणाऱ्या अन्नधान्यावर अवलंबून असलेली शहरे निर्माण होत.

इ. स. १५१९ मध्ये मेक्सिकोत पोहोचणाऱ्या स्पेनवासियांना स्टॅटेलोल्कोमध्ये हजारो लोक रत्ने, मौल्यवान धातू, गुलाम, सॅन्डल्स, कापड, चॉकलेट, दोर, कातडी, टर्की, भाजीपाला, ससे, कुत्री आणि हजारो प्रकारची मातीची भांडी यांची खरेदी-विक्री करत असलेले पाहून आश्चर्याचा धक्का बसला.

जर्मन बँकर्ससाठी निघालेल्या १६व्या व १७व्या शतकातील खाजगी वितरणातील वृत्तांत, दि फुग्गर न्यूज लेटर, त्या काळच्या व्यापाराचे विविधरंगी स्वरूप दाखवितो. भारतातील कोचीनमधील एका पत्रात युरोपात पाठविण्यासाठी मिरी खरेदी करायला पाच जहाजे घेऊन आलेल्या एका युरोपीय व्यापाऱ्यावर चाललेल्या खटल्याची सविस्तर हकीकत आली आहे.

तो म्हणतो, की, “मिरीचा व्यापार हा एक उत्तम धंदा आहे; फक्त त्यासाठी उत्साह आणि चिकाटी यांची आवश्यकता आहे.”

हा व्यापारी लवंगा, वेलदोडे, जायफळ, जायपत्री, कणिक, काही औषधे युरोपीय बाजारात नेत असे.

तरीदेखील, शेतीमजुरांनी ताबडतोबीच्या स्वतःच्या वापरासाठी केलेल्या उत्पादनाच्या प्रमाणात हा व्यापार म्हणजे एका तत्त्वाचे केवळ चिन्हच म्हणावे लागेल.

सोळाव्या शतकाच्या उत्तरार्धापर्यंत भूमध्य सागरीय विभागात एका टोकाला स्पेन आणि फ्रान्स व दुसऱ्या टोकाला तुर्कस्तान असलेल्या प्रदेशात ६० ते ७० दशलक्ष लोक राहत होते. या लोकसंख्येच्या नव्वद टक्के लोक जमिनीतून येणाऱ्या उत्पादनावर जगत होते. व्यापारयोग्य वस्तूंचे फार थोड्या प्रमाणात उत्पादन होत होते, असे या कालखंडातील इतिहासाचे निर्विवाद निष्कर्ष काढणारे संशोधक फर्नाँ ब्रॉडेल यांचे म्हणणे आहे.

ते आणखी म्हणतात, “भूमध्य सागरीय भागातील एकूण उत्पादनाच्या साठे किंवा सत्तर टक्के उत्पादन बाजारीय अर्थक्षेत्रात कधी आलेच नाही.”

या क्षेत्रातली ही स्थिती, तर उत्तर युरोपातली काय असेल? खडकाळ जमीन आणि अतिथंड दीर्घ हिवाळे, तिथल्या जमिनीतून शेतकऱ्यांना कितीसे उत्पादन काढू देत असतील? आणि तेही किती कष्टाने!

औद्योगिक क्रांतीच्या पूर्वीच्या पहिल्या लाटेच्या आर्थिक स्थितीचे आपल्याला जर नीट आकलन झाले, तर दोन वेगळे भाग धारण करणाऱ्या तिसऱ्या लाटेचे आकलन सोपे होईल.

‘अ’ विभागात लोक स्वतःच्या उपयोगासाठी उत्पादन काढीत असत, तर ‘ब’ विभागाचे लोक उत्पादन, व्यापार किंवा वस्तूंची अदलाबदल करून करावयाच्या खरेदी-विक्रीसाठी करत असत.

‘अ’ विभाग खूप विस्तृत होता. बहुतांश लोकांसाठी उत्पादन आणि वापर या गोष्टी एका जीवनदायी प्रक्रियेत एकत्र गुंफलेल्या अवस्थेत होत्या. ही एकात्मता इतकी पक्की होती, की ग्रीक, रोमन आणि मध्ययुगीन युरोपीय दोहोंतला फरक करत नव्हते. एवढेच नव्हे, तर ‘ग्राहक’ हा शब्दही त्यांच्या भाषेत नव्हता.

पहिल्या लाटेच्या संपूर्ण युगात लोकसंख्येचा अगदीच लहान भाग बाजारावर अवलंबून होता. बहुतेक लोक त्याच्या बाहेरच असत.

दुसऱ्या लाटेने झटक्यात ही स्थिती बदलून टाकली.

अत्यंत स्वयंपूर्ण लोक किंवा समाज यांच्या जागी तिने इतिहासात पहिल्यांदाच अशी स्थिती निर्माण केली, की मोठ्या प्रमाणातील संपूर्ण, सर्व प्रकारचे अन्नधान्य, वस्तू आणि सेवा या विक्री, अदलाबदल आणि देवाण-घेवाण यांच्या कक्षेत गेल्या.

खुद्द स्वतःच्या किंवा कुटुंबाच्या वापराच्या वस्तू निर्माण करण्याची पूर्वीची कल्पनाच तिने पूर्णतः नाहीशी करून टाकली. आणि अशी एक वेगळीच संस्कृती निर्माण केली, की जिच्यात कोणीही, अगदी शेतकरीदेखील, इथून पुढे कधीच स्वयंपूर्ण होऊ शकणार नाही.

अन्न, वस्तू आणि सेवा यांच्या बाबतीत प्रत्येकजण पूर्णतः दुसऱ्या कोणावर तरी अवलंबून राहण्याची वेळ आली.

थोडक्यात, औद्योगिकीकरणाने उत्पादन आणि वापर यांची एकी फोडली. उत्पादकापासून ग्राहक वेगळे फोडले. पहिल्या लाटेची एकसूनी अर्थव्यवस्था ही दुसऱ्या लाटेत भेगाळलेली अर्थव्यवस्था बनून गेली.

बाजाराचा अर्थ

या पद्धतीचे परिणाम महत्त्वाचे ठरले. तरी आपल्याला ते क्वचितच समजतात.

एकेकाळी एक छोटे किंवा वर्तुळाबाहेरचे ठरेल असे बाजार हे तत्त्व म्हणजे जीवन झपाटून टाकणारे एक झंझावाती वादळ बनून राहिले आहे. अर्थकारण ‘बाजारी’ बनून गेले. आणि ही गोष्ट समाजवादी व भांडवलवादी दोन्ही प्रकारच्या औद्योगिक अर्थकारणाच्या बाबतीत घडली.

पाश्चात्त्य अर्थशास्त्रज्ञांचा कल, बाजार ही जीवनाची पूर्णतः भांडवलशाही बाब आहे असे मानण्याचा आहे. त्यातूनही हा शब्द ते ‘फायद्याचे अर्थशास्त्र’ याचा समानार्थी म्हणून वापरतात.

तरीदेखील इतिहासाच्या अभ्यासाने आपल्याला हे कळते, की देवाण-घेवाण म्हणजेच बाजाराची जागाही फायद्याच्या अगोदर, त्याच्याहून स्वतंत्रपणे अस्तित्वात आली होती.

कारण स्पष्टच सांगावयाचे तर बाजार म्हणजे देवाण-घेवाणीचे जाळे. जणू तो एक स्विचबोर्डच. त्याच्यामार्फत वस्तू वा सेवा संदेशांप्रमाणे त्यांच्या योग्य स्थळी नेऊन पोहोचवतो. तो काही मुळात भांडवलशाही नाही.

असा स्विचबोर्ड फायद्याच्या उद्दिष्टाने प्रेरित झालेल्या औद्योगिकतेला जसा आवश्यक आहे, तसाच समाजवादी औद्योगिक समाजासाठीही आवश्यक आहे.

थोडक्यात, जिथे म्हणून दुसऱ्या लाटेने प्रभाव पाडला, तिथे उत्पादनांचे उद्दिष्ट वापरापेक्षा अदलाबदल हे ठरले. आणि ही अदलाबदल अमलात येण्यासाठी यंत्रणेची आवश्यकता होती. बाजाराची आवश्यकता होती.

बाजार उदासीन, अक्रियाशील असून उपयोग नव्हता. अर्थशास्त्रीय इतिहासाचे अभ्यासक कार्ल पोलान्यी यांनी असे दाखवून दिले आहे, की पूर्वी जो बाजार समाजांच्या सामाजिक किंवा आर्थिक, सांस्कृतिक उद्दिष्टांपुढे गौण ठरला होता, तोच नंतर औद्योगिक समाजांचे प्रमुख उद्दिष्ट ठरला.

पुष्कळ लोक चलन-मूल्यांकन प्रणालीत खेचले गेले. व्यापारी मूल्ये केंद्रस्थानी आली. सरकारे समाजवादी असोत की भांडवलवादी, त्यांचे मुख्य उद्दिष्ट ठरले—आर्थिक भरभराट.

कारण बाजार ही एक विस्तार पावणारी, स्वतःला मजबूत ठेवू शकणारी संस्था होती. अगदी सुरुवातीच्या श्रमविभागणीने व्यापाराला प्रोत्साहन दिले होते, त्याप्रमाणे आता बाजाराचे केवळ अस्तित्वच उलट अधिक श्रमविभागणीला प्रोत्साहन देऊ लागले. आणि त्यायोगे उत्पादकतेत प्रचंड वाढ झाली.

स्वतःच विस्तृत पावणारी एक प्रक्रिया कार्यान्वित झालेली होती.

बाजाराचा हा स्फोटक विस्तार जगाच्या ध्यानीमनी नसतील अशा राहणीमानाच्या उंचीला वेगाने उंचावण्याला साहाय्यभूत ठरला.

राजकारणात मात्र उत्पादन आणि वापर यांच्या भेदातून निर्माण झालेल्या नवीनच प्रकारच्या संघर्षामुळे दुसऱ्या लाटेतील सरकारे अधिकाधिक व्यथित होत गेलेली आढळली.

मार्क्सवाद्यांनी वर्गकलहावर जो भर दिला, त्यामुळे उत्पादकांच्या—कामगार व व्यवस्थापक दोघांच्याही—अधिक पगाराच्या, अधिक फायद्याच्या आणि अधिक नफ्याच्या मागण्यांमध्ये आणि ग्राहकांच्या [यात खुद्द तेच लोकही असतात] कमी दरांच्या मागण्यांमध्ये उद्भवलेला अधिक मोठा, अधिक खोल संघर्ष झाकून गेला.

आर्थिक धोरणाचा काटा दोन्ही तरफेच्या या टेकूवरच झुलत राहिला.

अमेरिकन संयुक्त संस्थानात झालेली ग्राहक चळवळीची वाढ, नुकत्याच सरकारने कमी केलेल्या किमतींच्या वाढीविरुद्ध झालेल्या उठावांमध्ये, ब्रिटनमध्ये अखंड चालू असलेले दरांबाबतचे आणि मिळकतीबाबतचे वादंग, ग्राहकोपयोगी वस्तूंना की अवजड उद्योगांना प्राधान्यक्रम याविषयीच्या वादाच्या पायाभूत कल्पनांना धरून रशियात चाललेले भीषण झगडे—ह्या सर्व गोष्टी म्हणजे, भांडवलशाही असो की समाजवादी असो, प्रत्येक समाजात उत्पादन आणि वापर यांच्यातल्या फुटीमुळे उत्पन्न झालेल्या मूळ संघर्षाची अंगे आहेत.

केवळ राजकारणातच नाही, तर सांस्कृतिक क्षेत्रातही फरक पडला.

ह्या फाटाफुटीमुळे इतिहासात पहिल्यांदाच पैशांचाच विचार करणारी, लोभी, व्यापारीभूत आणि हिशोबी संस्कृती निर्माण झाली.

दि कम्युनिस्ट मॅनिफेस्टोने नव्या समाजावर केलेल्या आरोपांशी सहमत होण्याला एखादा माणूस मार्क्सवादीच असावा लागतो असे नाही.

“माणसामाणसांत दुवा उरला आहे तो निर्लज्ज स्वार्थीपणाचा, निब्बर ‘रोख फेडणुकीचा’. व्यक्तिगत संबंध, कौटुंबिक बंध, प्रेम, मैत्री, शेजाऱ्यांचे किंवा सामाजिक बंध या सर्व गोष्टी बाजारू स्वार्थात विरघळून गेल्या आहेत; या गोष्टी बाजारू स्वार्थाने भ्रष्ट केल्या आहेत.”

मार्क्सने माणसांच्या ऋणानुबंधात निर्माण झालेला हा अमानुषपणा अचूक ओळखला. पण त्याला त्याने भांडवलशाहीच्या माथी मारले, हे मात्र चूक होते. अर्थात, त्याने हे जेव्हा लिहिले, तेव्हा त्याकाळी त्याला औद्योगिक समाज भांडवलशाही स्वरूपातच दिसला असला पाहिजे.

आता, अर्धशतकाहून अधिक काळ समाजवादावर आधारलेल्या औद्योगिक समाजाचा अनुभव घेतल्यानंतर आपल्याला हे समजून चुकले आहे की, हावरटपणा, व्यापारातील भ्रष्टाचार आणि माणसामाणसांतील ऋणानुबंधातील घट या गोष्टींचा शुद्ध आर्थिक तत्त्वांवर विचार करता त्या काही केवळ भांडवलशाहीच्या मक्त्यातील नव्हेत.

पैसा, वस्तू, पदार्थ यांच्यात असलेला व्यापक विचार पाहता त्यांच्यात भांडवलशाही किंवा समाजवाद यांच्यापेक्षा औद्योगिकीकरणाचेच प्रतिबिंब पडलेले आढळून येईल.

सर्व समाजांमध्ये बाजाराकडे आलेली मध्यवर्ती भूमिका, जिच्यात उत्पादनाची वापराशी फारकत झालेली आहे, जिच्यात प्रत्येक जण आपल्यात असलेल्या जीवनोपयोगी वस्तूंच्या उत्पादनकौशल्यापेक्षा बाजारावरच अवलंबून आहे, तिचे हे प्रतिबिंब आहे.

राजकीय रचना कोणतीही असो, अशा समाजात केवळ वस्तूच आणल्या, विकल्या किंवा बदलल्या जात नाहीत, तर श्रम, कल्पनाशक्ती, कला आणि फार काय, आत्म्यांचाही व्यापार होत असतो!

बेकायदेशीर कमिशन खिशात टाकणारा पाश्चात्त्य एजंट, साहित्य पसंत केल्याबद्दल लेखकाकडूनच उलट काही स्वीकारणारा रशियन संपादक किंवा अगोदरच कामाचा मोबदला असूनही व्होडकाच्या बाटलीची (जादा) मागणी करणारा प्लंबर—हे सगळे एकाच माळेचे मणी.

केवळ पैशांसाठी लिहिणाऱ्या फ्रेंच किंवा अमेरिकन किंवा ब्रिटिश कलाकारांहून, पोलिश, झेक किंवा रशियन कादंबरीकार, चित्रकार किंवा नाटककार वेगळे नाहीत. कारण तेही बोनस, किंवा नव्या गाडीच्या प्राप्तीसाठी प्राधान्य, किंवा इतर अप्राप्य गोष्टी अशा जादा अधिक लाभासाठी आपली कला विकत असतात.

अपुर्ण शिल्लक भाग २ पुढील लेखामध्ये.

📖 स्रोत : तिसरी लाट — Alvin Toffler यांच्या The Third Wave या पुस्तकाचा मराठी अनुवाद.
अनुवादिका : शरदिनी मोहिते
प्रकाशक : महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई