* विजय गायकवाड | Vijay Gaikawad: आपले प्राचीन 'संपन्न' रसायनशास्त्र..

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

आपले प्राचीन 'संपन्न' रसायनशास्त्र.. लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
आपले प्राचीन 'संपन्न' रसायनशास्त्र.. लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

२१/२/२३

आपले प्राचीन 'संपन्न' रसायनशास्त्र..

पाऱ्याचा शोध नेमका कोणी लावला? ह्या प्रश्नावर निश्चित असे उत्तर कोणीच देत नाही. पाश्चात्त्य जगाला तर अगदी सतराव्या शतकापर्यंत पाऱ्याची नीट ओळख नव्हती. इजिप्तमधल्या पिरामिडमधे इसवी सनाच्या १८०० वर्षांपूर्वीचा पारा ठेवलेला आढळला. पारा विषारी असतो याबाबत सर्वांचेच एकमत आहे.म्हणूनच १४० पेक्षा जास्त देशांनी पाऱ्याचा समावेश असलेल्या भारतीय आयुर्वेदिक औषधींवर तीन वर्षांपूर्वी प्रतिबंध लावला होता,जो नंतर उठवला गेला.


मात्र गंमत म्हणजे हा विषारी समजला जाणारा पारा,इसवी सनाच्या दोन/अडीच हजार वर्षांच्या आधी,वेगवेगळ्या क्षेत्रांत भारताद्वारे वापरला जात होता.इसवी सनाच्या पाचशे वर्षांपूर्वीपासून तर हा आयुर्वेदात वापरला जातोय.अगदी पोटात घेण्याच्या औषधांमध्ये..! आता,पाश्चात्त्य जग ज्याबद्दल तीनशे वर्षांपूर्वीपर्यंत पूर्णपणे अनभिज्ञ होतं,अशा विषारी पाऱ्याचा उपयोग साधारण अडीच हजार वर्षांपूर्वीपासून आपण औषध म्हणून करतोय,हेच मुळात आश्चर्य आहे.

आणि अशा प्रकारे पाऱ्याचा उपयोग करताना त्याची पूर्ण 'प्रोसेसिंग' करून तो वापरला जायचा हे महत्त्वाचं.


आपल्या संस्कृतीत ज्याप्रमाणे जन्मापासून मृत्यूपर्यंत मनुष्यावर सोळा संस्कार केले जातात, त्याप्रमाणे पाऱ्यावर अठरा प्रकारचे संस्कार करून मगच तो औषधाद्वारे सेवन करण्यायोग्य होतो. हे १८ संस्कार आहेत -


१.स्वेदन, २.मर्दन,३.मूर्च्छन,४.उत्थापन,

५.पातन,६.रोधन,७.नियामन,८.संदीपन,

९.गगनभक्षणमान,१०.संचारण,११.गर्भदृती,

१२.बाह्यदृती,१३.जारण,१४.ग्रास,१५.सारण,

१६.संक्रामण,१८.शरीरयोग


वाग्भटाचार्यांनी लिहिलेल्या 'रस रत्नसमुच्चय' या ग्रंथात पाऱ्याच्या औषधी उपयोगाबद्दल बरीच सविस्तर माहिती दिलेली आहे.हा ग्रंथ साधारणपणे सन १३०० च्या आसपास लिहिला गेलेला आहे.यातील माहिती ही,संकलित आहे.अर्थात जे ज्ञान आधीपासूनच माहीत आहे, त्याला हे तेराव्या/ चौदाव्या शतकातले वाग्भटाचार्य शब्दांकित करून,सविस्तर समजावून आपल्यापुढे (हे वाग्भट वेगळे आणि 'अष्टांग हृदय' हा आयुर्वेदाचा परिपूर्ण ग्रंथ, पाचव्या शतकात लिहिणारे वाग्भट वेगळे.)


वेगळ्या प्रक्रियांचे विधी सविस्तर दिलेले आहेत. अर्थात किमान दोन अडीच हजार वर्षांपूर्वीपासून आपल्या भारतीयांना हे 'रसायन शास्त्र' फार चांगल्याप्रकारे माहीत होतं आणि आपल्या पूर्वजांनी त्याचा अत्यंत पद्धतशीरपणे विकास केलेला होता.


'रस रत्नसमुच्चयात'दिलेल्या माहितीनुसार दोला यंत्र,पातना यंत्र,स्वेदनी अधः-पालन यंत्र,यंत्र,जारणा यंत्र,विद्याधर (ऊर्ध्वपातन) यंत्र,सामानत यंत्र,बालुका यंत्र,लवण यंत्र,हंसपाकयंत्र,भूधर यंत्र,कोष्टी वलभी यंत्र,तिर्यकपातन यंत्र,पालिका यंत्र,नाभी यंत्र,इष्टीका यंत्र,धूप यंत्र,स्वेदन (कंदुक) यंत्र,तत्पखल यंत्र... अशा अनेक यंत्रांचा उपयोग 'रसशाळेत' केला जायचा.या यंत्रांद्वारे पारद (पारा),गंधक इत्यादींवर रासायनिक प्रक्रिया करून औषधं तयार केली जायची.


नागार्जुनाने 'रस रत्नाकर' या ग्रंथात सिनाबार या खनिजापासून पारद (पारा) मिळविण्याच्या आसवन विधीचा विस्ताराने उल्लेख केला आहे. असाच विधी 'रस रत्नसमुच्चय' आणि पुढे चरक / सुश्रुत यांच्या संहितेतही आढळतो.यात आसवन प्रक्रियेसाठी ढेकी यंत्राचा उपयोग सांगितलेला आहे.गंमत म्हणजे ज्या आधुनिक पद्धतीने पारा प्राप्त केला जातो,तो विधी,ह्या ग्रंथात दिलेल्या विधीसारखाच,फक्त आधुनिक साधनांनी केलेला,आहे...!


हे फार महत्त्वाचं आहे.ख्रिस्तपूर्व पाचशे / सहाशे वर्षांपूर्वी आपल्या पूर्वजांनी अत्यंत व्यवस्थित, well defined, systematic अशा अनेक रासायनिक प्रक्रिया वापरायला सुरुवात केली होती,ज्यांचं मानकीकरण (standardization) त्याच काळात झालेलं होतं.


आचार्य सर प्रफुलचंद्र रे (सन १८६१ ते १९४४) यांना आधुनिक काळातील आद्य रसायनशास्त्रज्ञ म्हटले जाते.

यांनीच भारताची पहिली औषधं निर्माण करणारी कंपनी,'बेंगाल केमिकल्स अँड फार्मेस्युटीकल्स'स्थापन केली.इंग्रजांच्या वरिष्ठ वर्तुळातही यांना बराच सन्मान होता. ह्या प्रफुलचंद्र रे ह्यांनी एक सुरेख पुस्तक लिहिलंय -


'हिंदू केमिस्ट्री' नावाचं. या पुस्तकात त्यांनी ठामपणे हे मांडलंय की,रसायनशास्त्राच्या निर्मितीत आपले हिंदू पूर्वज कितीतरी पुढे होते. या पुस्तकात त्यांनी वेदांमधे असलेला वेगवेगळ्या रसायनांचा उल्लेख,अणू / परमाणूंच असलेलं विस्तृत विवेचन,चरक आणि सुश्रुत यांनी रसायनांवर केलेले विस्तृत प्रयोग यांबद्दल विस्तारानं लिहिलं आहे.अगदी त्या काळात असलेल्या केस रंगवण्याच्या कलेपासून ते पाऱ्यावर केलेल्या वेगवेगळ्या प्रयोगांपर्यंतचे अनेक संदर्भ या पुस्तकात येतात. धातुशास्त्राबद्दलसुद्धा या पुस्तकात त्यांनी लिहिल आहे.१९०४ मध्ये लिहिलेल्या ह्या पुस्तकाने इंग्रज संशोधकांचा आयुर्वेद आणि आपल्या प्राचीन रसायनशास्त्राकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला.


आपल्या वेदामध्ये रसायनशास्त्रासंबंधी अनेक उल्लेख येतात.आयुर्वेदात अश्मन,मृत्तिका (माती),सिकता (वाळू),अयस (लोखंड किंवा कांसे),श्याम (तांबे),सीस (शिसे) यांच्या मदतीने केलेल्या प्रयोगांची उदाहरणं आहेत.


तैत्तिरीय संहितेचा भाष्यकार,'सायण' याने श्यामचा अर्थ काळे लोखंड असा केला आहे. यजुर्वेदात एका मंत्रात अस्ताप (Iron Smelter) चा उल्लेख आहे.लोखंडाच्या खनिजाला लाकूड / कोळशाने तापवून कशा प्रकारे लोखंड हा धातू तयार केला जातो याचे वर्णन यात केलेले आहे. अथर्ववेदात शिसे या धातूवर 'दधत्यम सीसम..' नावाचे पूर्ण सूक्त आहे.शिशाचे बनवलेले छर्रे युद्धात वापरायचे असा अर्थ यातून ध्वनित होतो...


प्राचीन काळातील यज्ञशाळा ह्याच या देशातील मूळ रसायनशाळा होत्या.


तैत्तिरीय संहितेत यज्ञशाळेत/ रसायनशाळेत लागणाऱ्या उपकरणांची सूचीच दिलेली आहे

इष्य - इंधन

बर्ही - फुंकणी किंवा स्ट्रॉ

वेदि / घिष्ण्य - अग्नी निर्माण करण्याच्या जागा,ज्यातून रासायनिक प्रक्रियांसाठी लागणाऱ्या भट्ट्या निर्माण झाल्या.

स्त्रुक - चमचे

चमस - प्याले / भांडी

ग्रावस - खल-बत्ता मधील बत्ता

द्रोणकलश - रसायने ठेवण्याचे लाकडी पात्र 

आघवनीय - रसायनांचे मिश्रण करण्याचे पात्र

ही यादी बरीच लांबलचक आहे.पण याचा अर्थ स्पष्ट आहे.त्या वैदिक काळात,शास्त्रशुद्धरीत्या तयार केलेल्या रसायनशाळा होत्या.तेथे कोणकोणत्या वस्तू / पात्रं असावीत हे निश्चित होतं.आणि करण्यात येणाऱ्या प्रक्रिया सुद्धा निश्चित आणि ठरलेल्या होत्या.


शतपथ ब्राम्हण,ऋग्वेद,यजुर्वेद,अथर्ववेद इत्यादी ग्रंथांत ठिकठिकाणी रसायनं आणि त्यांचे विविध क्षेत्रांत होणारे उपयोग यासंबंधी विवेचन आढळते.


या काळात जगाच्या इतर भागात, रसायनशास्त्रासंबंधी असे सुस्पष्ट,व्यवस्थित आणि प्रक्रियेसहित केलेले विवेचन आढळते का..? उत्तर नकारार्थी आहे.इजिप्तमधे काही मोजके उल्लेख आढळतात आणि चीनमधे चीनने अनेक रसायनांवर त्या काळात काम केल्याचे दिसते.मात्र हे सोडलं तर जगात इतरत्र कोठेही रसायनशास्त्र इतक्या प्रगत अवस्थेत आढळत नाही.


अकराव्या शतकातील चक्रपाणी दत्तने 'चक्रदत्त' नावाचा ग्रंथ लिहिलाय.जुन्या माहितीला शब्दबद्ध करून तो सुसूत्रपणे आपल्यासमोर ठेवतो.यात त्याने ताम्ररसायन बनविण्याचा विधी दिलेला आहे.पारा,तांबे आणि अभ्रकावर प्रक्रिया करून त्याला गंधकाचा पूट देऊन ताम्ररसायन कसे तयार करतात,हे त्याने समजावून सांगितले आहे.याच पद्धतीने 'शिलाजतुरसायन' चे विवरण आहे.


चक्रपाणीच्या दोनशे वर्षांनंतर शारंगधराचार्य यांनी लिहिलेल्या 'शारंगधर संहिते'मधे अनेक रसायन प्रक्रियांबद्दल उल्लेख आहेत. मात्र यात सुरुवातीलाच लिहिले आहे की,जुन्या ऋषी-मुनींनी आपापल्या संहितांमध्ये जे श्लोक दिलेले आहेत,आणि अनेक चिकित्सकांनी ज्यापासून यश मिळवले आहे.अशा श्लोकांचे हे संकलन आहे.या संहितेत आसव,काढे बनवताना रासायनिक प्रक्रिया अत्यंत विस्तृतपणे दिलेल्या आहेत.


या किंवा अशा अनेक ग्रंथांमध्ये कणादच्या अणू / परमाणू सिद्धांताचा उल्लेख केलेला आढळतो.कणादने सांगितले आहे की,


 एका प्रकारचे दोन परमाणू संयुक्त होऊन 'द्विणूक' निर्माण होऊ शकते.द्विणूक म्हणजेच आजच्या शास्त्रज्ञांनी परिभाषित केलेला 'बायनरी मॉलीक्युल' वाटतो.


प्राचीन भारतात रासायनिक प्रक्रियांसंबंधी बरीच माहिती होती.याच पुस्तकातील 'अदृश्य शाईचे रहस्य' या लेखात,पाण्यात भूर्जपत्र टाकल्यावर दिसू शकणाऱ्या शाईचे वर्णन केले होते.अशा प्रकारची शाई तयार करताना अनेक प्रयोग, अनेक रासायनिक प्रक्रिया त्या काळात केल्या असतील.वातावरणातील आर्द्रता,प्राणवायू, अनेक आम्लीय / क्षारीय पदार्थांबरोबर धातूंचा संपर्क झाल्यावर होणाऱ्या प्रक्रिया... यातून धातूंच्या संरक्षणाचे उपाय.. या साऱ्या गोष्टी तेव्हा माहीत होत्या.'याज्ञवल्क्य स्मृती' मध्ये धातूंना शुद्ध करण्याची प्रक्रिया दिली आहे. 'रसार्णव' मधे सांगितलं आहे की,शिसे,लोखंड, तांबे,चांदी आणि सोने ह्या धातूंमध्ये स्वसंरक्षणाची प्रवृत्ती ह्याच क्रमात कमी होत जाते,जी आजच्या आधुनिक रसायनशास्त्राप्रमाणे बरोबर आहे.


हे खरं आहे की,आजच्या रसायनशास्त्राने अफाट प्रगती केलेली आहे. 


मात्र आजपासून दोन / अडीच हजार वर्षांपूर्वी रसायनशास्त्राचे मूलभूत सिद्धांत मांडत,अत्यंत व्यवस्थित,परिपूर्ण अशी डॉक्युमेंटेड सिस्टम भारतामधे कार्यरत होती,ज्यांद्वारे अनेक क्षेत्रांत रासायनिक प्रक्रियांद्वारे कार्य होत होते.औषधी शास्त्र,खनिज शास्त्र,धातुशास्त्र यांसारखी अनेक क्षेत्रं होती,ज्यात रासायनिक प्रक्रिया आवश्यक होत्या.मात्र महत्त्वाचे म्हणजे ही सर्व रसायने, जैविक स्रोतांपासून प्राप्त केली जात होती. संपूर्ण नैसर्गिक पद्धतीने ह्या प्रक्रिया चालत होत्या.


आणि हे सर्व करत असताना आपल्या पूर्वजांनी इतकी मोठी विरासत आपल्यासाठी मागे ठेवली आहे,की त्यातील अनेक प्रक्रियांचा नीट अर्थ लावणंच आपल्याला शक्य झालेलं नाही. अर्थातच प्राचीन रसायनशास्त्राच्या अभ्यासाची आज नितांत निकड आणि गरज आहे...!!


१५ फेब्रुवारी २०२३ या लेखातील पुढील भाग..