'पाण्याच्या बचतीचा टाटा पॅटर्न'
आम्ही पैसे भरतो पाण्याचे... हवे तेवढे वापरू... हवे तसे वापरू... अशी उद्दाम भाषा बऱ्याच वेळा ऐकायला मिळते.आणखी दुसरी बाजू... करोडो रुपये उलाढाल असलेल्या कंपन्यांमध्ये पाण्याच्या बिलाची रक्कम किती? त्याची किंमत ती किती ? हे दोन्ही विचार पूर्णपणे बाजूला सारून,पैसे भरले म्हणजे वाटेल तो हक्क मिळाला किंवा किंमत कमी आहे म्हणून त्यात काय वाचवायचे असा कोणताही समज करून न घेता पाणी वाचवणे ही सामाजिक जबाबदारी आहे आणि त्याची पैशात किंमत कमी असली तरी त्याचे मोल अमुल्य आहे.हे जाणून व्यापाराआधी समाज कल्याणाचे उत्तरदायित्व सांभाळणाऱ्या टाटा मोटर्स कार प्लांटमधील पाणी बचतीचे व पाणी पुनर्वापर संबंधित ही कंपनीतील ध्येयवादी पर्यावरण रक्षण विचाराने सांघिक कामगिरी केलेल्या विविध यशस्वी उपायांची ही कहाणी..!
गिरीश लिमये हे टाटा मोटर्स कार प्लांट इन्व्हरमेंट डिपार्टमेंट संबंधीत अधिकारी आहेत.....
आमच्या एन्व्हायरमेंट डिपार्टमेंटच्या मासिक बैठकीत लक्षात आलं की गेली दोन महिने कंपनीतील पाण्याची मागणी आधीच्या महिन्यांच्या आणि गेल्या वर्षाच्या तुलनेत खूपच जास्त आहे.आमचा दर दिवशीचा,दर महिन्याचा अन् दर वर्षीचा अनेक हिशेबापैकी एक
म्हणजे पाण्याचा हिशोब! दर दिवशी किती पाणी लागले? प्रत्येक कार मागे किती पाणी लागले? त्याची पैशात रक्कम किती? हे हिशोब करताना लक्षात आले की गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी रक्कम खूप वाढली आहे.कारखान्यातील प्रॉडक्शन तर नेहमी होते तेवढेच होते,कामगार व अधिकाऱ्यांची संख्या ही तेवढीच होती.मग इतकी पाण्याची मागणी का वाढली? याचा आढावा घेतानाच उच्च अधिकाऱ्यांनी इन्व्हारमेंट डिपार्टमेंटला सांगितले की पाणी वापर,पाणी मागणी आणि पाणी बिल कमी करायला हवे. सांगा या एक वर्षात तुम्ही मागणी किती टक्क्यांनी कमी करणार ?... कोण उत्तर देणार? शेवटी कोणी तरी पुटपुटत म्हटलं दहा टक्क्यांनी मागणी कमी करू!!
मीडियम स्केल व लार्ज स्केल कंपन्यामध्ये ईतर अनेक डिपार्टमेंट बरोबरच एक इन्व्हरमेंट डिपार्टमेंट असते.त्यांना कंपनी संबंधित पर्यावरणाच्या अनेक गोष्टी कराव्या लागतात. त्यात (हजार्डस् वेस्ट डिस्पोजल) विघातक कचऱ्याची विल्हेवाट,एस.टी.पी.व ई.टी.पी. यांच्या कामाचे नियंत्रण,दुरुस्ती,उभारणी हे महत्त्वाचे काम असते.कंपनी कँटीनच्या उरलेल्या अन्नाची विल्हेवाट,तसेच कंपनीतील हवेची गुणवत्ता व कंपनीतून बाहेर पडणाऱ्या हवेत मिसळणाऱ्या विविध घटकांचे प्रमाण यावरचे नियंत्रण व कार्यवाही ही महत्त्वाची कामे असतात.त्याचबरोबर सर्वप्रकारे वापरायच्या पाण्याची गुणवत्ता आणि सांडपाण्याची योग्य विल्हेवाट ही संवेदनशील कामे या विभागाकडे असतात.या सर्व गोष्टींच्या नोंदी ठेवणे,त्यांची माहिती आपल्या व्यवस्थापनाला व विविध सरकारी,निमसरकारी सरकारी संस्थांना पाठवणे, तसेच सर्व प्रकारचे कायदेशीर पत्रव्यवहार ठेवणे ही ही कामे या विभागाची असतात.
पण सध्या तरी सर्वात महत्त्वाचा संवेदनशील विषय म्हणजे पाणी आणि सांडपाणी !! तर वरिष्ठ साहेबांचा सर्वांसमोर विषय चालू होता. वर्षाआड दुष्काळ आणि पाण्यावर चर्चा,जगात चालू आहे.त्यांनी सांगितले दहा टक्के पाणी वापर कमी करणे हे काही चॅलेंजेस होऊ शकत नाही ते म्हणजे सहज होणारे आहे!! आव्हान नेहमी मोठे असावे, आव्हान आव्हान वाटले पाहिजे!! तरच माणूस झगडतो... घ्यायचं तर निम्मे पाणी वाचवू असे काहीतरी घ्या वगैरे वगैरे, सगळं इन्व्हरमेंट डिपार्टमेंट डोक्यावर डोंगर पडल्यासारखे एकमेकाकडे पाहायला लागले. पण साहेबांसमोर बोलणं शक्य नव्हतं. हो म्हणण्याशिवाय पर्याय नव्हता. हे कसं काय शक्य होईल..!
तीन महिन्यानंतर पहिला रिपोर्ट द्यायचा होता. आता प्रत्येक कार मागे जेवढं पाणी लागत होतं. ते आता आम्हाला निम्म्यावर आणायचं होतं. आता हे फक्त इन्व्हारमेंट डिपार्टमेंटच्या आटोक्यात येणारं काम नव्हतं.आता कार प्लांटमधील सर्व शॉप्स म्हणजे लोअर शॉपमधून पाणी-पर्यावरणप्रेमींचा एक गट स्थापन करायचं ठरलं!!
टाटा मोटर्स म्हणजे पूर्वीची टेल्को ही अकराशे एकरमध्ये वसलेली.कंपनीचा कार प्लांट हा साधारण 'तीनशे एकरात'व्यापलेला विभाग आहे.तिथे सगळे मिळून सात हजार लोक काम करतात.येथे सर्व प्रकारच्या टाटा ब्रँडच्या कार्स बनवल्या जातात.तर ह्या पाणी टीममधील लोक त्यांच्या नेहमीच्या कामाव्यतिरिक्त हे पाण्यासाठी काम करणार होते. याला क्रॉस फंक्शनिंग टीम असे नाव दिले. या टीममध्ये सिव्हिल आणि बांधकाम डिपार्टमेंट आणि फायनान्स डिपार्टमेंटला आवर्जून घेतले. प्लंबिंग आणि इतर तत्सम कामासाठी कन्स्ट्रक्शन डिपार्टमेंट आणि सर्वच आलेल्या गोष्टी फायनान्स डिपार्टमेंटला माहित असतील तर बजेट मंजूर करायला अडचण नको म्हणून फायनान्स डिपार्टमेंट,आता काम सुरू झाले.... एकेक शॉपच्या पाण्याचा हिशोब मांडणे व तपासणी करणे सुरू झाले. यातून सगळ्यात जास्त पाणी लागणारे ते सगळ्यात कमी पाणी लागणारे अशी क्रमवारी ठरू लागली.पहिल्या नंबर होता पेंट शॉपचा !! तो सर्वात जास्त पाणी संपवणारा,वापरणारा होता !! सर्वात जास्त पाणी का लागते ? आता एकेक गोष्ट तपासण्यास सुरुवात झाली.लक्षात आलं की एक जुनी पाईपलाईन व एक नवीन पाईपलाईन आहे.जुनी पाईपलाईन आणि त्याचा व्हाल्व चालू आहे.ते पाणी कुठे जाते हे कळत नव्हते. वापरले तर जात नव्हते. लगेच पाईप लाईन बंद केली.याने चक्क अडीच ते तीन लाख लिटर पाणी वाचू लागले..... ही एक नवीन दिशा देणारी गोष्ट होती!!
आता प्लांटमधील सर्वच पाईपलाईनचा सर्वे सुरू झाला.त्यांचे नियोजन व निरीक्षण व सुरू झाले. मग एकेक गोष्ट सापडत गेली.अशीच एक मोठी गोष्ट आढळली.कुलिंग टॉवरला पाणी सर्क्युलेट व्हायला हवे होते.पण तिथला रिटर्न हॉल बंद होता आणि पाणी परत परत वापरले जाण्याऐवजी ते बाहेर जाऊन एटीपीला जाऊन मिळत होते. तो पण व्हाल्व बदलला न् एक ते दीड लाख लिटर पाणी वाचायला लागले.
अंडरग्राउंड पाणी वॉटर लाईन्स चेक केल्या तर त्यांची गळती बऱ्याच प्रमाणात होती.मग दुरुस्ती किंवा नवीन पाईप टाकले. तिथेही हळूहळू एकेक करून एक ते दीड लाख लिटर पाणी वाचायला लागले.पाईपलाईनचे हे सर्व प्रकारचे काम हाताळून झाले.त्यात बरेचसे यश हाती लागले.आता एकेका शॉपमधील पाण्याच्या वापराकडे वळलो.एक JLR नावाचं शॉप आहे, तिथे गाडी धुतली जाते. ती माणसांनीच धुवावी लागते.तेथील सुपरवायझर व कामगाराशी चर्चा केली.त्यांचे समुपदेशन केले.गाडी स्वच्छ सुंदर धुवा,हयगय नका,पण अशा अशा पद्धतीने पाणी वाचवणे शक्य आहे.हे हे करा,यासाठी त्यांना एक चेकलिस्ट दिली.त्याप्रमाणे त्यांचे बिहेविअर चेंजिंग आणि प्रिसिजन वर्किंग हे अगदी गाडी धुण्याच्या कामातही शक्य आहे,हे त्यांना व आम्हाला ही उमगले. त्या शॉपला रोज एक लाख लिटर पाणी वाचायला लागले.
आतापर्यंत आम्ही तर निम्मी लढाई जिंकली होती.टारगेट ठरवलं होतं.त्याच्या निम्मे पाणी आम्ही आता वाचवू लागलो होतो.आमचा आत्मविश्वास दुणावला,उस्ताह वाढला.यापूर्वीचे रेकॉर्ड तपासले असता प्रत्येक कार बनवण्यासाठी लागलेले कमीत कमी पाणी किती त्यापेक्षा आम्ही बराच खाली आणला होता पाणी वापर..!
आमचे टीम वर्क सुरू होते.आता आमचा टिम मेंबर प्रत्येक शॉपमधील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पाणी संवर्धन हा विषय घेऊन पोहोचला होता. कंपनीतल्या प्रत्येकाला या विषयात गुंतवायचे होते.त्यांच्या सूचना,त्यांच्या सवयी,नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर इत्यादी सर्वच बाबतीत त्यांच्यावर लक्ष द्यायचे होते.बऱ्याच वेळा आम्ही या कामातला वेळ ८० टक्के नियोजनामध्ये घालवला आणि प्रत्यक्ष कामाला त्यामुळे २० टक्के वेळ लागला.
आता प्रत्येक शॉपचा ही पाणीवापर महिन्यागणिक हळूहळू का होईना कमी होऊ लागला.
प्रत्येक शॉपच्या टॉयलेट ब्लॉकची जबाबदारी एकेका लीडरला दिली.ती त्या कुठल्याही लिकेजसाठी,कोणत्याही सूचनेसाठी, सुधारणेसाठी त्यांनी जबाबदारी स्वीकारली होती. दरम्यान आम्ही पूर्ण प्लांटमधील सर्वांसाठी खुली पाण्याविषयीची घोषवाक्यची स्पर्धा ठेवली त्यास उत्स्फूर्त आणि मोठा प्रतिसाद मिळाला. या निमित्ताने आमची माहिती त्यांच्यापर्यंत अधिक कळकळीने पोहोचली.त्यांची विचारशक्ती काम करू लागली. आणि यातून त्यांची जागरूकता वाढली.
दरम्यान सर्व ठिकाणचे कॉक बदलण्यात आले. पूर्वीचे २१ सेकंद पाणी देण्याऐवजी आता अकरा सेकंद चालणारे कॉक बसवले गेले. आता त्यातून पन्नास टक्के पाणी वाचू लागले होते..
पाणी वाचवण्याचे प्रयत्न चालूच होते.त्याच बरोबर पाणी साठवणे,पाण्याचे शुद्धीकरण, सांडपाणी शुद्धीकरण आणि पुनर्वापर या माध्यमातूनही काही योजना हाती घेतल्या होत्या. त्यातून ही यश साधले.तसे झिरो डिस्चार्ज कंपनी म्हणून आम्ही २०१३ मध्येच त्या टप्प्यावर पोहोचलो होतो.पण आता आमचा पाण्याचा इन टेक वाढत होता.आजही आम्ही झीरो डिस्चार्ज स्टेटसमध्ये आहोत पण पाण्याची एमआयडीसीकडून खरेदी निम्म्यावर आली आहे.
पाणी साठवण्याचे उपाय म्हणजे रेन वॉटर हार्वेस्टिंग !! ही सिस्टिम पूर्वी काही प्रमाणात उभारली होती पण ती वापरली जात नव्हती. त्याकडे चुकून अनेक वर्ष दुर्लक्ष झाले होते.मग त्यासंबंधीचे सगळेच बिल्डींग ड्रॉइंग,पाईपलाईन लेआउट वगैरेचा अभ्यास करण्यात आला व शक्य तिथे शक्य ते दुरुस्त केले.तर काही ठिकाणी समांतर नवीन पाईपलाईन टाकली,पावसाळ्यात तीन महिने हे पावसाचे पाणी साठवण्याची आमची क्षमता इतकी आहे की त्यातून सर्व प्लांटची पिण्याच्या पाण्याची गरज भागेल.
पावसाळ्यातील या तीन महिन्यातील एमआयडीसीकडून विकत घेत असलेल्या पाण्याची मागणी इतकी कमी झाली की तीन महिने मिळून तीस टक्के पाणी बिल वाचले!! पाणी साठवणूक रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या माध्यमातून अजून वाढविण्याचे नियोजन सुरू आहे.त्यासाठी भूगर्भातील पाणी साठवणुकीसाठी योग्य खडक याचा शोध घेऊन म्हणजेच अॅक्विफर मॅपिंग करून आणि रिचार्ज झोन ठरवून जिथून पाणी उत्तम रीतीने जमिनीत जीरु शकणार आहे.हा भाग शोधून जास्तीत जास्त पाणी जमिनीत मुरून पाण्याबाबत स्वयंपूर्ण व्हायचे स्वप्न आहे.त्यामुळे आणखी ही एक मोठे स्वप्न साकार करता येईल ते म्हणजे टाटा मोटर्स कार प्लांट निसर्गातून जेवढे पाणी वापरण्यासाठी घेते तेवढे किंवा त्यापेक्षा थोडे का होईना अधिक पाणी निसर्गाला परत देण्याची सोय करणे.
तो टप्पा ही लवकरच पार करू असा विश्वास टाटा मोटर्सच्या एन्व्हारमेंट टीमला नक्की आहे.
या टीमने मध्ये तयार झालेल्या सांडपाण्याचा पुनर्वापर यावर ही बरेच काम केले आहे. ईटीपीच्या माध्यमातून सांडपाण्यावर प्रायमरी व सेकंडरी ट्रीटमेंट करतातच,पण tirsury म्हणजे थर्ड स्टेज ट्रीटमेंट व रिव्हर्स ऑस्मॉसिस ट्रीटमेंटमधून अधिकाधिक स्वच्छ पाणी मिळवले जाते.इंडस्ट्रीतील ट्रीटमेंट प्लांटमधील आर.ओ. प्लांट हा पिण्याच्या पाणी मिळवण्याकरता असणाऱ्या प्लांटपेक्षा वेगळा असतो.म्हणजे यातील फिल्टर मेंब्रेन वेगळ्या वैशिष्ट्यांनी युक्त असतात व मेम्ब्रेन संख्येने पण जास्त असतात. त्या मेंब्रेन्सच्या किमतीही खूप जास्त असतात. त्याचबरोबर त्यांचे आयुष्यही तुलनेने जास्त असते.
तर ह्या प्लांटमधून बाहेर पडणारे पाणी पेंट शॉपमध्ये वापरतात.पेंट शॉपमध्ये काही केमिकल्स बनवण्यासाठी मिनरल वॉटर लागते, ते ह्या आरो प्लांटमधून उपलब्ध होते. या प्रक्रियेमुळे उपलब्ध होणाऱ्या पाण्यामुळे रोज ७ ते ८ लाख लिटर पाणी दर दिवशी वाचू लागले. विविध शॉपवर ठिकाणी स्वच्छतेसाठी लागणारे पाणी ही आम्ही यातलेच वापरतो.
या प्लांटमधला निघणारा गाळ निघतो त्यातील पाणी काढून टाकतो. त्याला विशिष्ट मशिनने गरम करून वाळवतो.
या सर्व कामापलीकडेही आमचे अजून प्रयत्न असणार आहेत.नवनवीन कल्पना,तंत्रज्ञान, लोकसहभाग यांचा वापर करून पाण्याची मागणी कमी कशी करता येईल असेही आमची टीम म्हणते.
Waterless Urinals, E.T.P. मधील काही पर्यायी प्रक्रिया आणि रेन वॉटर हार्वेस्टिंग यातून आम्ही आमच्या ध्येयाच्या बरेच पुढे जाऊ असाही आत्मविश्वास आहे.
याबरोबरच सहा हजार लोक रोज कंपनीत जेवतात.त्या किचनचे किचन वेस्ट ही पाणी खराब/प्रदूषित करणारा घटक आहे.त्याची विल्हेवाट लावणे ही कंपनीची जबाबदारी आहे. त्यावर उपाय म्हणून आम्ही त्यातून बायोगॅस बनवता येईल असा मोठा प्लांट उभा केला आहे. कॅन्टीनमध्ये स्वयंपाकासाठी या बायोगसचा उपयोग होतो.
" संगणके जेउते नेले "
'माळ्याच्या मळ्यामधी पाटाचे पाणी जाते' हे आपल्याला ठाऊक असते.पण आताच्या काळात पाटापाटातून झुळझुळ पाणी नेलंय नव्हे तर शेतीला,बागेला पाणी किती व कधी द्यायचे नियोजन संगणक करतो.इंटरनेट ऑफ थिंग ही ह्या दशकाची क्रांतीच,भारतात इंटरनेट ऑफ थिंगचा वापर शेतीसाठी पाणी नियोजना करिता व व्यावसायिक तत्वावर पहिल्यांदा केला तो चक्रधर बोरकुटे यांनी..!
चक्रधर नागपूरच्या रायसोनी कॉलेज मधून २००३ मध्ये इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअर झाला. आवडीचा विषय आणि त्यात चांगली गती होती तरी नोकरीसाठी पुण्यात आल्यावर पहिली नोकरी करावी लागली ती बँकिंग मार्केटिंगची. काही काळातच त्यात चांगला जम बसवला.हे चांगले चालू लागले होते पण इलेक्ट्रॉनिक संबंधित काम करण्याचा निश्चय मनात कायम होता.इलेक्ट्रॉनिक्समध्ये कामाची संधी एकदा आली पण पगार अगदी नगण्य म्हणावा असा होता.पगारापेक्षा महत्वाचे वाटले ते आपल्या ज्ञानाचा व्यवहारात करता येवू शकणारा उपयोग आणि त्यातून मिळणारा आनंद.... मग मनावर घेतले आणि भविष्य घडविण्याचे काम आत्मविश्वासाने सुरू केले.बँकिंग मार्केटिंगच्या काळातच एका सॉफ्टवेअर कंपनीत ही काम केले होते.पगार व आर्थिक प्रगतीसाठी तेव्हाही आणि आताही सॉफ्टवेअर ही सर्वात चांगली संधी समजली जाते.पण चक्रधर तिथे रमला नाही.थोडा अनुभव पोतडीत भरून घेतला.
तो एका इलेक्ट्रोनिक चीप्स डिझाईन करण्याच्या कंपनीत काम करू लागला.मेहनती चक्रधर वर मालकाचा विश्वास बसला.इलेक्ट्रॉनिक हार्डवेअर व सॉफ्टवेअर डिझाईन करणारी ही कंपनी मालकाने एक दिवस अचानक चक्रधरलाच चालवायला दिली.मालक स्वतः बेंगलोरला तिकडे खूप काम असल्यामुळे निघून गेले.
मग या कंपनीचे सर्व नियोजन चक्रधर कडे आले.त्याची चीप्स डिझाइन बरोबरच विवेक सावंत सरांच्या एमकेसीएल बरोबर ट्रेनिंग प्रोग्रामची ही कामे चालू होती. काही कंपन्यांसाठी ऑटोमेशन चे काम होते ते केले. त्याच दरम्यान एका गृहप्रकल्पाचेही सिक्युरिटी साठी ऑटोमेशनचे काम केले.असे विविध स्तरावर विविध प्रकारचे काम सुरू होते.
दरम्यान २००९ मध्ये विवाह झाला.सौ.चेतना याही इलेक्ट्रॉनिक्स इंजीनिअरींगच्या पदवीधर असल्याने तर त्यांच्या कंपनीची टेक्निकल बाजू अधिकच भक्कम झाली.त्यांचे एक मित्र प्रशांत पाटील हेही त्यांच्या सल्लागाराच्या भूमिकेत तेव्हापासून आजपर्यंत आहेतच.
रेल्वे मंत्रालयाबरोबर रेल्वेसाठी विविध इलेक्ट्रॉनिक्स ऑटोमेशनच्या यंत्रणांची ऑर्डर चक्रधरच्या कंपनीला २०१५ मध्ये मिळाली होती.त्यानिमित्ताने रेल्वे अधिकाऱ्यांच्या सतत भेटी होत असत.तिथेच लुपिन फाऊंडेशनच्या योगेश प्रभूंची भेट झाली.योगेश प्रभू यांच्याशी चर्चा करताना शेतीमधील इलेक्ट्रॉनिक्स व आटोमेशन याबद्दलही चर्चा झाल्या.योगेश प्रभू आणि त्यांचे लुपिन फाउंडेशन हे समाजकार्य म्हणून ग्रामविकास आणि त्यातही विशेषतः शेती व शेतकरी विकासाविषयक खूप कामे करत असल्यामुळे शेतीतल्या गरजा काय आहेत हे त्यांना चांगलेच ठाऊक आहेत.चक्रधर विविध सेन्सर बनवतात व त्यावर आधारित अनेक यंत्रणाही,त्या प्रगत राष्ट्रांमध्ये मोठमोठ्या कंपन्यांसाठी बनवतात,हे योगेश प्रभू व त्यांचे वरीष्ठ श्री.रावसाहेब बढे यांना समजल्यापासून शेतीसाठी असे काही संवेदक विकसित व्हायला हवे हे वाटत होते.विशेषतः योग्य इरिगेशन सिस्टिमसाठी,या विषयीची चर्चा चक्रधर बरोबर झाली आणि त्यातून कल्पना पुढे आली की सिस्टीम आणि जमिनीतली आर्द्रता संवेदकाने मोजणे व त्याआधारावर पिकांसाठी सिंचन करणे हे काम व्हायला हवे.हे आपली कंपनी हे काम करू शकते चक्रधरांच्या लक्षात आले. चक्रधर,त्याचा मित्र प्रशांत पाटील व पत्नी चेतना यांनी भरपूर अभ्यास करून विविध प्रयोग करून पूर्ण स्वयंचलित सिंचन व्यवस्था शेतीसाठी विकसित केली. त्यात इलेक्ट्रॉनिक व I.O.T (Internate of Things) चा उत्तम मिलाफ आहे. पिकांना योग्य प्रमाणात पाणी देणे हे तसे खूप आव्हानात्मक काम आहे आणि त्यासाठी ही स्वयंचलित सिंचन व्यवस्था पूर्णपणे उत्तर ठरते. आपण यासाठी आधी पिकांना योग्य प्रमाणात पाणी म्हणजे काय याविषयी चर्चा करू म्हणजे ते लक्षात येईल.
योग्य प्रमाणात पाणी म्हणजे नक्की काय व किती यासाठी काही माहिती आधी मांडावी लागेल.जमिनीवरील पिकांची वाढ ही प्रामुख्याने जमिनीखाली मुळांच्या वाढीवर अवलंबून असते. मुळे सजीव असल्याकारणाने पीक वाढीच्या काळातील शोषून घेत असताना श्वसनही करत असतात.मात्र त्यासाठी जमिनीत पाणी व हवा यांचे योग्य संतुलन असणे आवश्यक असते. जमिनीतील हवा व पाण्याच्या समतोल असण्याला वापसा म्हणतात.ही वापसा अवस्था जेवढे जास्त काळ पिकाच्या वाढीस दरम्यान राहील तेवढे पीक जोमदार येते.जमिनीत पाणी जास्त असेल परंतु पिकास शोषून घेता येत नसेल तर झाडाची पाने पिवळी पडतात,त्यांची वाढ खुंटते,हीच अवस्था जास्त काळ राहिली तर पीक मरते देखील,तसेच या उलट जमिनीत पाणी कमी राहिले,हवा जास्त राहिली तर पिकास पाणी कमी पडते.अन्नद्रव्य कमी पडत जातात.पाने कोमेजतात,पीक वाळू लागते आणि ही अवस्था जास्त काळ राहिली की पीक मरते.
पीकाच्या उत्तम वाढीसाठी जमिनीतून झाडाद्वारे पाण्याचे योग्य प्रमाणात शोषण होणे आवश्यक असते.त्यामुळे जमिनीत सेंद्रिय घनपदार्थ ५० टक्के,पाणी २५ टक्के आणि हवा २५ टक्के असे संतुलन आवश्यक असते.जमिनीतील किंवा शेतीतील पाणी नक्की कुठे कसे असते तेही थोडक्यात पाहू.जमिनीत मातीचे कण एकमेकांच्या जवळ येऊन समूह निर्माण करतात या मांडणीला मृदेची किंवा मातीच्या कणांची रचना असे म्हणतात.मातीच्या कणांच्या बारीक वालुकामय किंवा मध्यम जाड आकारावरून व प्रमाणावरून जमिनीचे वर्गीकरण ठरवतात.त्यालाच जमिनीचा पोत असे म्हणतात.जमिनीच्या पोतावर पाण्याची जलधारणाशक्ती,पाण्याची वाहकता जमिनीतील सूक्ष्म कृमींची (उपयुक्त बॅक्टेरीया) वाढ अवलंबून असते. जमिनीतील किंवा मातीतील पाणी तीन प्रकारचे असते.मातीच्या कणाने शोषलेले पाणी, मातीच्या कणांच्या भोवतीच्या पोकळीत साठलेले पाणी आणि खाली खाली जाणारे मुक्त पाणी…
जमिनीची सच्छिद्रता म्हणजे माती कणांच्या आकारमान व त्यांची रचना यावर साधारणतः ५० टक्के इतकी असते.जमिनीच्या हलक्या भारी प्रतवारीप्रमाणे ती कमी जास्त होते.
या सर्व गोष्टीची व्यवस्थित माहिती,त्यांचे शास्त्रीय ज्ञान,पिकाच्या वाढीची अवस्था, त्या त्या वेळी त्या त्या पिकाची पाण्याची गरज, तसेच हवामानातील ऋतूपरत्वे बदल यावर बदलणारी पाण्याची गरज,त्याप्रमाणे पाण्याचे मोजमाप या सर्व गोष्टी पाणी व्यवस्थापनासाठी अत्यावश्यक ठरतात.
आयओटीने जगात तिसरी क्रांती आणली आहे असे म्हटले जाते.पहिली औद्योगिक क्रांती,दुसरी संगणक क्रांती आणि तिसरी ही इंटरनेट ऑफ थिंग्सची क्रांती.यातूनच कृत्रिम प्रज्ञा म्हणजे आर्टिफिशिअल इंटेलिजन्स उगम झाला आहे. हे अगदी थोडक्यात सांगायचे तर स्वतः निर्णय घेणारा व त्यावर आधारित कृतीही करणारा संगणक !! यापूर्वीचे संगणक कसे आहेत ? तर त्यांना जे विशिष्ट काम करायचे आहे त्यासाठी खास प्रणाली (Software) विकसित करायची त्यात बाहेरून कोणी तरी माहिती भरणार (Data input) त्यावर कम्प्युटर किंवा संगणक निष्कर्ष देणार आणि त्यावर आधारित कृती परत माणसाला करावी लागणार.पण आता गेल्या दशकभरात हळूहळू अनेक क्षेत्रात आयओटीचा वापर वाढत आहे.सुरुवातीला फक्त उत्पादन क्षेत्रात येणाऱ्या कारखान्यातून यांचा वापर सुरू झाला.पुढे वैद्यकीय क्षेत्र व्यापले, आता वाहतूक क्षेत्र व्यापत चालले आहे आणि तो आता तर घराघरात येऊन पोहोचला आहे.शेतीसाठी आयओटी चा वापर सुरू आहे.पण भारतामध्ये तर बहुतेक बोरकुटे हेच पहिल्या पाच लोकांमध्ये असतील ज्यांनी तिचा वापर आपण शेती व सिंचनासाठी करूया असा विचार केलाय. किंबहुना आता तर ते पहिलेच आहेत सिंचनासाठी गेटवेचा वापर करून सिंचनाची सर्व यंत्रणा स्वयंचलित करून दाखवणारे! यात त्यांना त्यांच्या पत्नीची बरोबरीने साथ आहे. सौ. चेतना यांनी काही काळ पुण्यातील नामवंत इंजिनीअरिंग महाविद्यालयात प्राध्यापक म्हणूनही काम केले आहे.त्याच काळात त्या त्यांच्या विषयात सल्लागार म्हणून महाराष्ट्रभर प्रसिद्ध झाल्या.नंतर प्राध्यापिकेची नोकरी सोडून पूर्णवेळ कंपनीची मुख्य जबाबदारी सांभाळून लागल्या.संशोधन व उत्पादनाचे डिझाईन ही त्यांची महत्त्वाची जबाबदारी आहे.
या पाणी व्यवस्थापनातील यंत्रणेबाबत चर्चा करताना त्यांनी सांगितले की आमचे संवेदक पाचपट स्वस्त आहेत.पण त्याहीपेक्षा महत्वाचे म्हणजे ते सहजी कोणालाही हाताळता येतात, वापरता येतात.फूटभर उंचीचे हे संयंत्र जमिनीत नऊ-दहा इंच खोल रोवतात.वर एक डबी सारखा छोटा भाग असतो.त्यात बॅटरी असते.ही बॅटरी किमान तीन वर्षे टिकते.एका एकरासाठी दोन संवेदक पुरतात.संवेदक,गेट-वे व सॉफ्टवेअर हे सगळे मिळून एक एकरासाठी तीस हजाराची गुंतवणूक एकदाच होते.हे संवेदक काढून दुसरीकडे ही बसवता येतात.हे संवेदक जमिनीखालील नउ इंचापर्यंतची आर्द्रता सांगू शकतात.
फळपिकासारखा पिकांची मुळे अधिक खाली जात असल्याने तिथे काय करायचे असे विचारल्यावर त्यांनी सांगितले की फूट दीड फूट खड्डा करून तिथून खाली हे संवेदक रोवायचे.त्याला बाजूला थोडं संरक्षित करायचे.द्राक्षबागेत दोन-तीन ठिकाणी अशीच खड्डे घेऊन त्यात छोट्या बादलीच्या तळाला छिद्र पाडून त्या बादलीतून खाली नेऊन हे संवेदक रोवले. ही कल्पना शेतकऱ्यांचीच बरं का! ही यंत्रणा बाफना फार्म,केसनंद वाघोली (पुणे जिल्हा) येथे आणि मोहोळ तालुक्यातील एके ठिकाणी द्राक्ष बागायतीसाठी उभी केली आहे.तर जुन्नरला वैष्णव धाम (बुचकेवाडी) येथे फळबागेबरोबरच भाजीपाला आणि अगदी ज्वारीसाठीही ही वापरली आहे.या यंत्रणेमुळे सर्वोच्च काय साधले जाते तर ते म्हणजे प्रिसिशन इरिगेशन (Precision Irrigation) पाणी देण्यातली अचूकता.त्यातून पाण्याची वाढलेली उत्पादकता!
'वर्तमान काळात सातत्याने जिवंत राहण्याचं सजग उद्दिष्ट बाळगणारी सामान्य व्यक्ती म्हणजे " संन्याशी " होय.'
( रास्ट )
खरचं हे कार्य नम्र होण्याचे 'शिक्षण' देवून गेले.
कोणत्याही प्रवाहापासून ३० मीटर बांधकामे असू नयेत,असा नियम असताना ओढ्यातच बांधकामे करण्यापर्यंत गोष्टी गेल्या आहेत. तसेच हे खूप कमी कालावधीत घडले,फक्त आठ - दहा वर्षात..बांधकामाचा म्हणजे जमीन,इमारतींनी व्यापलेला हा वेग निसर्गाचा पूर्ण विध्वंस करत गेला व जात आहे.
'पाण्याचा पत्ता सांगणारा माणूस'
डॉ. श्रीकांत गबाले म्हणजे पाण्याचा पत्ता सांगणारा व पाण्यापर्यंत पोहोचायचा नकाशा काढून देणारा माणूस.
पाणी व्यवस्थापन कुठलेही असो... छोट्या घरातलं,खेड्याचं,शहराचं,धरणाचं कालव्याचं, की पुराचं सुद्धा... आराखडे आणि नकाशाशिवाय काहीच करता येत नाही. एकावेळी दहा-दहा नकाशांचा संदर्भ द्यायचा आहे,हजारो रीडिंगची पडताळणी करायची आहे, अशा कामासाठी लागतात कम्प्युटरवर पाहता येतील असे नकाशे,त्यांचं आकलन उत्तम रीतीने करून त्यासाठी आवश्यक असलेल्या सॉफ्टवेअरमध्येही पारंगत होऊन पाणी विषयात अनेक विविध प्रकल्पांना सल्लागार म्हणून काम करणाऱ्या डॉ. श्रीकांत गबालेंची आणि त्या निमित्ताने भौगोलिक माहिती प्रणाली व दूरसंवेदन (Geographical Information system & Remote Sensing) या नवतंत्रज्ञानविषयीची ही कहाणी.....
खरंतर सुरुवातीपासून वसतिगृहात राहून शालेय शिक्षण पूर्ण करणारा श्रीकांत अकरावी शास्त्रसाठी मॉडर्न महाविद्यालयात आला. चुणचुणीत श्रीकांत अवांतर वाचनाच्या सवयीने पर्यावरणाबाबत हळवा झाला.आणि पर्यावरणात काहीतरी काम नक्की करायचं,तर भूगोलाचा अभ्यास करायला हवा... (खरंतर असं का वाटलं,की यासाठी भूगोलच घ्यायला हवा,याचं उत्तर आजही त्यांच्याकडे नाही...) पण ठरवून तो भूगोल विषय घेऊन बी.ए. झाला.खडक निर्माण शास्त्रातील पुढील शिक्षणासाठी एस. पी. कॉलेजमध्ये एम.एस्सी.ला प्रवेश मिळाला. (Geology यासाठी ही सोय आहे बी.ए. करून एम.एस्सी.ला प्रवेश मिळवता येतो.) खडक निर्माण शास्त्राबरोबरच बी.ए.फायनलला जीआयएस,आरएस हा विषय होता.नवीन तंत्र, संगणकचा वापर या गोष्टींमुळे आणि त्या विषयासाठी चांगले प्राध्यापक असल्याने त्यात श्रीकांत यांना जास्त रस वाटू लागला होता... एम.एस्सी.ला दुसऱ्या वर्षी प्रकल्प सादर करावा लागतो. खरंतर कॉलेज,विद्यापीठाने ही खूप उपयुक्त योजना विद्यार्थ्यांसाठी आखली आहे. आजवर घेतलेल्या ज्ञानाचा वापर,कौशल्यांचा वापर करत व्यवहारोपयोगी नवनिर्मिती करावी, त्यातून विद्यार्थ्यांच्या ज्ञानाचा,व्यक्तिमत्त्वाचा परिचय जगाला व्हावा हा उद्देश... पण फार थोडे विद्यार्थी या संधीचं सोनं करतात... बाकी सगळे टिक मार्क काम करतात.श्रीकांत ह्या थोड्या लोकांपैकी एक निघाला.प्रोजेक्टला काय विषय निवडायचा,ही चर्चा दुसऱ्या वर्षाचे कॉलेज सुरू झालं की सुरू होते.त्याच काळात बातम्या येत होत्या,कोकण रेल्वेच्या मार्गावर दरडी कोसळत आहेत.अशा दरडी कोसळण्याच्या घटना त्या वर्षी चार-पाच वेळा घडल्या.दरडी कोसळणे हा तर पूर्ण विषयच अभ्यासक्रमाचा,या विषयावरच काम करायचं,प्रोजेक्ट करायचं ठरले.त्यांच्या प्राध्यापकांनीही या विषयाला खूपच उचलून धरले.त्यावरच काम करण्यासाठी आखणी सुरू झाली. कागदावर काय करायचे, हे ठरवण्यासाठी आधी प्रत्यक्ष साईट व्हिजिट करणे आवश्यकच होते.मोठी दरड कोसळलेली 'कॉमेंट' गावात त्यांचे प्राध्यापक व वर्गमित्रांबरोबर साईट व्हिजिटसाठी श्रीकांत पोहोचले.तिथे मोठी रिटेनिंग वॉल बांधलेली होती,तिच्यासकट रेल्वे ट्रॅक मूळ जागेपासून ३२ फुटांनी सरकला होता. इतकी मोठी दरड कोसळली होती.या अनुषंगाने पुढे,मागे फिरून बाकी निरीक्षणही त्यांनी नोंदवले.मागे,पुढे बरेच बोगदे खणलेले होते. त्यांच्यावर जी गावं वसलेली होती त्यांच्या विहिरी आटल्या होत्या.जमीन कोरडी,नापीक झालेली होती.खूप विध्वंस झालेला होता निसर्गाचा... मग नकाशांचा अभ्यास झाला,पूर्वीचे जुने कागदावरचे नकाशे मिळवले गेले... ते जुळवले गेले,त्याचबरोबर सॅटेलाइट इमेजेसही तपासण्यात आल्या.त्यात पूर्वीच्या प्रवाहांचे ओढे,नाले,डोंगर,रस्ते,झाडे,प्रवाह त्यांचे आकार, आकारमान आणि दिशा तपासली गेली.दरड कोसळल्यानंतर प्रत्यक्ष परिस्थितीचे निरीक्षण केले.तेथील स्थानिक लोक व कोकण रेल्वेच्या कामासंबंधित लोक यांच्याशीही संवाद साधला. हा रेल्वेचा ट्रॅक डोंगराच्या तीव्र उतारावर होता. दरड कोसळली तिथून थोडेच पुढे दरीतील मोठा पूल होता. जो भारतातील दुसऱ्या क्रमांकाच्या उंचीचा होता... यावरून ट्रॅक किती उंचावर होता,याचा अंदाज येऊ शकेल. खूप तीव्र उतारावर ट्रॅकसाठी रुंदी मिळण्यासाठी बराच डोंगर तोडला होता.तसाच बराच भरावही घातला होता..! ठिकठिकाणी डोंगराचे लचके तोडल्याने व भरावामुळे अनेक प्रवाह मधेच तुटले होते, गायब झाले होते,वळले होते.त्यामुळे पाऊस झाल्यावर ओढ्यातून वाहत आलेले पाणी भरावात मोठ्या प्रमाणात घुसले,त्याच्या दबावाने रिटेनिंग वॉलवरही दबाव आला आणि तीच सरकली... रिटेनिंग वॉल भरावाला धरून ठेवण्यासाठी असते,तीच सरकली.भरावही खचला आणि पाण्याच्या दबावामुळे सरकलादेखील... या सगळ्यांचा शास्त्रोक्त पद्धतीने अभ्यास करताना व खडक,माती, डोंगर,दरी,खाच-खळगे,ओढे-नाले या सर्वांचा संदर्भ घेताना,त्यांची मांडणी करताना भौगोलिक माहिती प्रणालीचा जॉग्रफिकल इन्फॉर्मेशन सिस्टीम व रिमोट सेन्सिंग प्रथमच खूप मोठ्या प्रमाणात वापर करायला मिळाला.खूप मूलभूत ज्ञान खूप पक्के झाले.त्या विषयाच्या या अभ्यासातून या वेळी श्रीकांत व त्यांच्या सहकाऱ्यांनी या समस्येचे उत्तर रेल्वेचा ट्रॅक बदलणे,म्हणजे दुसऱ्या सुरक्षित जागेतून हा ट्रॅक नेणे आवश्यक आहे,असा निष्कर्ष काढला. अर्थात हा विद्यार्थी व प्राध्यापक पातळीवरचा अभ्यास होता रेल्वे खाते किंवा सरकारी पातळीवर यावर आधारित निर्णय होण्यासारखा नव्हता.यावर श्रीकांत यांनी 'इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी'च्या राष्ट्रीय परिषदेत शोधनिबंध सादर केला.त्यावर परिषदेत खूपच चर्चा झाली... तसेच या निबंधाला राष्ट्रीय पातळीवर दुसरा क्रमांक मिळाला. या सर्व प्रकल्प व शोधनिबंधातही डॉ. मनोज नरवणे, विभाग प्रमुख प्रोफेसर डॉ. श्रीकांत कार्लेकर यांचे पूर्ण मार्गदर्शन होते. श्रीकांतजी त्यांचा उल्लेख खूप कृतज्ञतापूर्वक वारंवार करतात... पुढे नंतर शासनाने नेमलेल्या तज्ज्ञ समितीने अहवाल घेऊन कोकण रेल्वेचा ट्रॅक बदलण्याचा सल्ला दिला.यावरून श्रीकांत व टीमचा अभ्यास व निष्कर्ष यावर शिक्कामोर्तब झाले. नंतर लवकरच हा शोधनिबंध 'डेक्कन ग्राफ जिओग्राफी' या जगप्रसिद्ध जर्नलमध्ये प्रसिद्ध झाला... यामुळे या प्रकल्पाला प्रतिष्ठा लाभली. यातून पुढच्या आयुष्याची प्रेरणा मिळाली... आत्मविश्वास वाढला.... दिशाही ठरली... जीआयएस व आर. एस. क्षेत्रातच काम करायचे ठरले. विद्यार्थीदशेतच असे यश मिळू शकते, यासाठी पुस्तकी व कॉलेजमधला अभ्यास आवश्यक आहेच,पण समाजाला सुद्धा सतत वाचत राहिले पाहिजे.त्यामुळे लोकसमस्या, व्यावहारिक समस्यांची जाण होते.त्या समस्या आपल्या ज्ञानाच्या माध्यमातून सोडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला,तर आपण खऱ्या अर्थी शिक्षण घेतले असे वाटते... इतकेच नाही, तर यात आपल्याला व्यावसायिक व जीवन याचे मार्ग निश्चित करून यश मिळवता येते. फारच थोडे लोक असा पर्याय स्विकारतात.
काय आहे जीआयएस आणि आरएस ? त्याचा पाण्याच्या कामाशी कसा संबंध आहे? जॉग्रफिकल इन्फॉर्मेशन सिस्टीम ही प्रणाली म्हणजे पृथ्वीच्या पाठीवरील सर्व घटकांची माहिती टिपणे... ती साठवणे... ती विविध रूपांत उपलब्ध करणे... तीवर वेगवेगळ्या प्रक्रिया करणे... त्यातून विविध अर्थ लावणे... त्या माहितीचे नियमन करणे... या सगळ्यांना स्थळांचे संदर्भ असतात... या प्रणालीत सॅटेलाइट कॅमेरा,संवेदक,हार्डवेअर,सॉफ्टवेअर या सगळ्या गोष्टींचा समावेश होतो विशिष्ट स्थळ निश्चित करणे,स्थळाचे टिपण घेणे,स्थळांवरची हवी ती माहिती घेणे, स्थळांचा आकार-मोजमाप ठरवणे. तिची माहिती व तिचे ठिकाण याची नोंद घेणे, माहितीची आकडेवारी नोंदवणे... माहितीत होणारे बदल टिपणे, विविध नोंदी वेळेवर उपलब्ध करणे इत्यादी.
भूगोलात आपण सर्वात जास्त कशाच्या साह्याने अभ्यास करतो,तर नकाशाच्या साहाय्याने... कितीतरी प्रकारचे नकाशे, सर्व भाषा, नकाशांची.भूगोल म्हणजे..... जमिनीवरच्या सर्व गोष्टींचा अभ्यास... यात खडकांचा अभ्यास व खडकांचे नकाशे,त्यात खडकांच्या वयाचे नकाशे वेगळे, त्यांच्या प्रकाराचे नकाशे वेगळे... कोणत्या भागात कोणते खडक असे अनेक प्रकार... मग जमिनीवरचे डोंगर, पर्वत, दरी, चढ उतार हे सर्व नोंदवणारे नकाशे,अगदी प्रत्येक बिंदूची समुद्रसपाटीपासूनची उंची,त्यावर आधारित कंटूर नकाशा... मग फक्त जंगलाच्या क्षेत्राचे नकाशे,त्यात पुन्हा उपविभाग सदाहरित जंगले,कुरणे,खुरटी जंगले इत्यादी,हवामानाच्या विविधता दाखवणारे नकाशे,पिकांचे स्थळे दाखवणारे नकाशे,खाणी कुठे कुठे आहेत त्याचे नकाशे,कोणते प्राणी कुठे सापडतात त्याचे नकाशे... महत्त्वाचे म्हणजे देशाच्या राज्यांच्या सीमा दाखवणारे... रेल्वे, रस्ते, विमान मार्ग, लोकसंख्या,लोकसंख्येवर आधारित असलेली सर्व माहिती, वेगवेगळी माहिती दाखवणारे... सगळी सगळी माहिती नकाशाद्वारे नोंद करता येते.ही सगळी माहिती आणि नकाशे लोकांच्या विविध सोयी,सुविधा यांच्या व्यवस्थापनासाठी घेतले जातात.आणि यातून खूप मोठ्या उलाढाली होत असतात..... यातील एकेका भागात हजारो उपविभाग, त्यातून माहिती... आणि माहिती... आणि माहिती... सर्व माहितीच्या साठवणुकीसाठी कम्प्युटरचा वापर सुरू झाला, १९६० मध्ये रॉजर टॉमजिन्सन याने सर्वप्रथम ही कल्पना मांडली,अस्तित्वात आणली,त्यांना जीआयएसचा जनक असे म्हणतात.
पंधराव्या शतकात नकाशा विषयावर विचाराने काम होऊ लागले.... युरोपातील दर्यावर्दी विविध विभागावर पोहोचू लागले... तिथे जाण्याचा मार्ग लक्षात ठेवून तो कागदावर उतरवू लागले.... युरोपातील राजांनी त्याचे महत्त्व ओळखले. त्यांनी या प्रक्रियेला प्रोत्साहन दिले.पुढे एकेक करून एका भूभागावर युरोपातील एकेक देश हक्क निर्माण करू लागला.त्यातून जन्मले भूभागाचे मापन आणि त्यातून जन्मल्या कागदावरच्या सीमा... त्या सीमांनी बनवले नकाशे... सोळाव्या शतकाच्या अखेरीस देशांच्या सीमा सांगणारा जगाचा नकाशा पुसटसा जन्माला आला होता... त्यात सतत नवनवीन भर पडत राहिली.... आणि आज याच नकाशाशास्त्रावर पृथ्वीवरील ८०० कोटी लोकसंख्येचे व्यवस्थापन सुरळीत सुरू आहे.
'आपल्या आजूबाजूच्या लोकांच्या संदर्भात आपण जितक्या जास्त प्रमाणात स्वतःची व्याख्या करू लागू तितके आपण अधिक हरवून जाऊ.'
'संन्याशासारखा विचार करायला' लावणारं वाक्य खुपच अद्भुत
आणि या पुस्तकातील शेवटच प्रकरण..
'दुर्गंधी हरवणारा प्रसन्न माणूस'
पुण्यातील ओंकारेश्वर मंदिराजवळ रघुनाथराव केळकर यांच्या समाधीसमोरची पुण्याती टाकी गाळाने भरली होती.वर्षानुवर्षे दुर्गंधी भरून राहिली होती. परिसरात एके सकाळी काही तरुण-तरुणी कुदळ-फावडे घेऊन आले... टाकीतला जमेल तेवढा गाळ या तरुण-तरुणींनी काढला... या मंडळींचे नेतृत्व करीत असलेला तरुण इंग्लंडमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेऊन आला होता. सिंगापूरमधून त्याने डॉक्टरेट मिळवली होती. या चमूने येथे एक पान गवत लावले काही दिवसातच पाणगवत वाढले.आणि दुर्गंधी गायब झाली... कामाला सुरुवात केली तेव्हा हेटाळणी व विरोध झाला होता,पण आता कौतुक होऊ लागले... 'नदीची दुर्गंधी हरवणारा' म्हणून बातम्या प्रसिद्ध झाल्या... प्रसन्न जोगदेव त्यांच्या तंत्रज्ञानासह पर्यावरण क्षेत्रातला एक नायक झाला.
जसजसा निसर्ग अधिक बारकाईने कळू लागलाय गेल्या चाळीस-पन्नास वर्ष,तसतसा त्याच्याकडेच स्वतःच्या दुरुस्तीची कशी व्यवस्था आहे हे समजते आहे.जसं आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वगैरे विषय आपण अनुभवतोय तसंच पाण्यात येणारे गवतच पाण्याला शुद्ध ठेवण्यासाठीची निसर्गाची रचना आहे.याच तत्वावर आधारित पानगवताच्या माध्यमातून दूषित पाणी शुद्ध करता येते.याची विविध उदाहरणे निर्माण करून एक नवा पर्यावरणीय पर्याय देत असलेल्या प्रसन्न जोगदेव यांच्याबद्दल आणि त्यांच्या तंत्रज्ञानाबद्दलची ही कथा..!
डकवीड म्हणजे पाणगवताची एक जात. हे गवत बदकांना खूप आवडते म्हणून त्याला 'डकवीड' म्हणतात.आपल्याकडे अशा प्रकारच्या गवताला 'टिकली गवत' असेही म्हणतात.हे दिवसागणिक खूप वाढते, म्हणजे पाण्यावर आडवे पसरत जाते.पाण्यातील विरघळलेल्या व न विरघळलेल्या पाणी प्रदूषीत करणाऱ्या अनेक घटकांना मुळाद्वारे शोषून घेते आणि त्यावर वाढते.
प्रसन्नने प्रोजेक्टसाठी डकवीड संबंधित विषय निवडला.डकवीडच्या काही जाती त्यांचे बनवलेले अन्न स्टार्चच्या स्वरूपात तर काही जाती प्रोटिन्सच्या रूपात जमा करून ठेवतात. प्रसन्नला त्याच्या प्रोजेक्ट व या विषयातली ताकद हळूहळू लक्षात येवू लागली.जगात यावर काम सुरू आहेच.भारतातील सांडपाण्याची व त्यातून आरोग्याची समस्या खूप मोठी आहे त्या दृष्टीने डकवीडच्या मदतीने सांडपाणी शुद्धीकरणाला खूप वाव मिळू शकेल,हे त्यांनी हेरले.हे उत्तम पशुखाद्य असल्याने प्रदूषण निर्मूलनाबरोबरच उच्च प्रतीचे पशुखाद्य निर्मिती हा दुहेरी फायदा साधता येईल असे त्याला वाटले.त्याने एम.एस. बायोटेक विषयात करतानाच ही दिशा ही निश्चित केली.
एम.एस.करून भारतात परतल्यावर काही दिवस फर्गसन कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून रुजू झाला.काम शिकवण्याचे होते,पण त्याचे जास्त लक्ष संशोधनावर होते.पुजा तेंडूलकर या विद्यार्थिनी बरोबर संशोधनासाठी प्राथमिक काम सुरू केले.विषय निवडला 'मुठा नदीच्या पाण्याच्या शुद्धीकरणासाठी पर्यायाची चाचपणी करणे.' तीन ठिकाणचे पाण्याचे नमुने गोळा केले,खडकवासला धरणाजवळ नदी सुरू होते तिथे; दुसरा नमुना ओंकारेश्वरजवळ;तिसरा नमुना संगम पुलाजवळ घेतला. खडकवासल्याजवळ म्हणजे जास्तीत जास्त मूळ स्वरूप नदीचे,ओंकारेश्वरजवळ म्हणजे जिथे जास्तीत जास्त शहराचे मैलापाणी नदीत येते आणि संगम पुलाजवळ इंडस्ट्रियल सांडपाण्याचा प्रवाह येऊन मिळतो.काम सुरु केले होते.कुणाला काही मदत मागायला गेले, परवानगी मागायला गेले किंवा माहिती सांगायला गेले की लोक प्रसन्नला पदवी, डॉक्टरेट,स्पेशलायझेशन याबद्दल विचारू लागले.प्रसन्नला प्रोत्साहनापेक्षा निराशजनक प्रतिसाद येऊ लागला.विषय जाईचना.
मग एका क्षणाला प्रसन्नने निर्णय केला की आपण डॉक्टरेट पूर्ण करून टाकू...!
गुणवत्तेच्या बाबतीत जगात अकरावा नंबर असलेल्या सिंगापूरच्या नानयांग टेक्नोलॉजिकल युनिव्हर्सिटी (NTU) या विद्यापीठात त्याने अर्ज केला.तिथल्या संशोधनासाठीच्या पायाभूत सुविधा व मार्गदर्शक दोन्हींच्या दर्जाने प्रसन्नला तिथेच जाणे इष्ट वाटले.त्याला डकवीडवरच संशोधन करुन डॉक्टरेट करायची होती.तशाच तयारीने तो गेला होता.पण जसजसा विषय पुढे सरकला, प्रयोग करण्यासाठी जागा वगैरेच्या परवानगी मागायला सुरू झाले त्या वेळी परत माघार घ्यावी लागली.कारण सिंगापूरला सर्वात मोठी टंचाई जागेची आहे आणि या प्रयोगाला तर काही ना काही जागा लागणारच होती.परत तलवार म्यान करावी लागली,ध्यास मात्र तसाच राहिला.
जागा नाही,प्रयोग नाही,तर निधी मिळणार नाही. सगळाच हिरमोड झाला.मग त्या विद्यापीठात Role of Microorganisms in marine corrosion' या विषयात डॉक्टरेट पूर्ण केली. प्रबंध पूर्ण होत गेला तसतशी भारतातील पुढील योजनेची तयारी सुरू केली.जुन्या समविचारी मित्रांना संपर्क करून काम सुरू करूया अशी चर्चा सुरू केली.काहींनी प्रतिसाद दिला आणि मग भारतात आल्यावर प्रसन्नने एका कंपनीची स्थापना केली.त्यात त्याची फर्ग्युसन कॉलेजची विद्यार्थिनी पूजा तेंडुलकर आणि इतर काही मित्र हे सहभागी आहेत.दरम्यान पूजा तेंडूलकरनेही सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प काही ठिकाणी यशस्वी केले होते.
कंपनीमार्फत २०१८ ला काम सुरू केले. 'लेमनिऑन ग्रीन सोल्युशन्स' असे कंपनीचे नाव. हे नाव भारतात जास्त प्रमाणात आढळणाऱ्या डकवीडच्या एका प्रजातीच्या नावावरून घेतले आहे.
डकविक हिरवे हिरवे खवले पाण्यावर तरंगत आहेत असं दिसतं ते किंवा दगडफूल हिरवं असतं तर कसं दिसलं असतं तसं ते दिसतं. पाण्यावर आडवी पसरत त्याची वाढ होते.मूळ खाली पाण्यात तीन ते चार इंचापर्यंत वाढतात. वनस्पतीशास्त्राच्या भाषेत ती 'अंजीओस्पर्म' या प्रकारातली.म्हणजे नेचे वगैरे प्रकारातली.अ अपुष्प वनस्पती आणि याचे पुनरुत्पादन विजिटेटीव्ह रिप्रोडक्शन प्रकारातून होते. भारताच्या पाच सहा प्रकारच्या जाती सापडतात पण विपुल प्रमाणात दिसणारी जात म्हणजे 'लेम्नि शिया' जगात आतापर्यंत ३६ प्रकारच्या डकवीडच्या जाती नोंदवल्या गेल्या आहेत.याचा वाढीचा वेग खूप जास्त असतो.आता बायोमास भाषेत सांगायचे झाले तर ५० ग्राम बायोमासचे दोन-तीन दिवसात शंभर ग्राम इतके बायोमास तयार होऊ शकते.या एकूण वजनात ३० ते ४० टक्के प्रोटीन असतात.ही प्रोटीन्स जनावरे व माणसे खाऊ शकतील अशा रासायनिक रचनांची असतात.मुख्य म्हणजे या डकवीडच्या मुळावर व पानांवर जे विशिष्ट बकरी असतात ते सांडपाण्यातील विविध विद्राव्य व अविद्राय घटकांचे विघटन करतात.ते विघटीत घटक डकवीड मुळावाटे शोषून घेते व आपल्या अन्नात व बायोमासमध्ये रुपांतर करते.त्यामुळे पाण्यातील विद्राव्य व अविद्राव्य घटक कमी कमी होत जातात.पाण्यातील हे घटक कमी झाल्याने हळूहळू ऑक्सिजन विरघळत जाऊन पाणी अधिक जिवंत होऊ लागते म्हणजे पाण्यात जीवसृष्टी वाढू शकेल अशी स्थिती निर्माण होते.
हे तंत्रज्ञान नवीन,विषय नवीन,कुठून कशी सुरुवात करायची? की एखादे काम हातात घ्यायचे?की व्यावसायिक पातळीवर पैसे गुंतविण्यासाठी कसे पुढे आणायचे? सगळेच प्रश्न होते.
याची उत्तरे प्रत्यक्ष पुस्तकात भेटतील.
जाता जाता...!
मेनका प्रकाशन यांनी खूपच आकर्षण पद्धतीने मांडणी करून जास्तीत जास्त पुस्तक आकर्षित बनवलेलं आहे. यांचे मनःपूर्वक आभार..!
'अभिनव जलनायक' हे पुस्तक मानवी जीवनातील 'जीवन' पाणी यासाठी नम्रपणे वाहिलेले आहे. जलसंवर्धनाचे आधुनिक तंत्रज्ञान आणि ते साकारणाऱ्या तंत्रज्ञानाच्या सरळ साध्या सोप्या गोष्टी सोप्या समजतील अशा भाषेत आहेत.
या पुस्तकाचे लेखक 'सतीश खाडे' हे माझे मनस्वी मित्र आहेत.युवराज माने यांच्यामुळे या अद्भुत व्यक्तिमत्त्वाशी माझी ओळख झाली.
तहानलेल्या माणसाला पाण्याची तहान लागते आणि पाणी पिल्यानंतर त्याला जसं आत्मिक समाधान मिळतं. तसंच कधीकधी 'पाण्यालाही' तहानलेल्या माणसाची तहान लागते व ते पाणी कोणत्या ना कोणत्या स्वरूपात त्या तहानलेल्या माणसाजवळ जाते. तसंच या पुस्तकाबद्दल म्हणावे लागेल.
स्वतःसाठी एक झोपडी बांध आणि जिवंत असतानाच स्वतःची चिरफाड करण्याची प्रक्रिया सुरू कर...!
एमर्सन हेन्री डेव्हिड थोरोला म्हणाला होता.
ह्या पुस्तकाचे परीक्षण व समिक्षा मी केलेली नाही,तर ह्या पुस्तकानेच माझे परीक्षण व समिक्षा केलेली आहे.( माझी जिवंत असतानाची चिरफाड केलेली आहे. )
अशी पुस्तके सोबत असणं म्हणजे अज्ञात आयुष्य ज्ञात करून परिपूर्णतेने प्रवास करण्यासारखं आहे.पुस्तकातील दोन ओळींमधील मोकळ्या जागेतील मी प्रवासी आहे.आणि या पुस्तकासोबत घेऊन केलेला प्रवास माझ्यासाठी अविस्मरणीय व अलौकिक असा आहे.
पाणी सर्वांसाठी तर या पाण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र यावं व एकत्रितपणे एकसारखे जीवन जगावं असा संदेश हे पुस्तक देते.
मेनन पिस्टन रिंग्ज या ठिकाणी मी फॉड्री मध्ये मी काम करतो.जास्त तापमानामध्ये काम करत असूनही माझं हे आयुष्य पाण्यासारखं शांत व शितल आहे.हे या पुस्तकाच्या संगतीचे परिणाम आहेत.
या पुस्तकाचं वाचन चालू असताना.एक महत्वाची घटना घडली ज्या घटनेने माझ्या आयुष्यामध्ये महत्त्वाचा बदल केला.
'सहित वितरणचे' शिंदे साहेब ज्यांना मी पुस्तकातील महान माणूस म्हणतो.त्यांना सहज मी बोलत असताना,या महिन्यांमध्ये पैशाचं गणित जमणार नाही.( ते मला कधीच जमत नाही) या महिन्यात मला पैसे अभावी पुस्तक घेता येणार नाहीत.नंतर घेतो'त्या वेळेला त्यांनी दिलेलं उत्तर माझ्यासाठी खूपच प्रेरणादायी होतं."पैशाचं नंतर बघू ते राहू दे ! मी पुस्तक पाठवतो.'काहीही झालं तरी तुमचं वाचन थांबवू नका.'मी तुमची पुढील पुस्तके मी पाठवून देतो. अशी महान माणसं मला अशा महान पुस्तकांमुळेच भेटलीत.
'अभिनव जलनायक' हे पुस्तक लिहून सतीश खाडे यांनी
' ज्या झाडाच्या सावलीत बसण्याचा त्यांनी कधी विचारही केला नव्हता,असे झाड त्यांनी आपल्या सर्वांसाठी लावलेले आहे.'
आपण करून दिलेली ही नवीन ओळख माझ्यासाठी माझं जनुक बदलणारी आहे.मी आपल्या लिखाणाचा मनापासून आभारी आहे. हे नवीन जीवन,नवीन दृष्टिकोन माझ्या उर्वरित आयुष्यासाठी एक संजीवनी ठरणार आहे. हे पुस्तक वाचल्यानंतर खऱ्या अर्थाने माझा जन्म झाला आहे.मी स्वतंत्र झालो आहे.
आपल्या सर्वांचे पुनश्च मनःपूर्वक आभार व धन्यवाद..!
◆विजय कृष्णात गायकवाड