प्राचीन काळी आपल्या देशात पाण्याचं व्यवस्थापन उत्कृष्ट होतं आणि म्हणूनच आपला देश
'सुजलाम सुफलाम' होता..!
पाण्याचं हे नियोजन किती चांगलं असावं.. ? तर जगातले पहिले ज्ञात आणि सध्याही वापरात असलेले धरण हे भारतात आहे,हे आपल्यापैकी किती लोकांना माहीत असेल..? इसवी सनाच्या दुसऱ्या शतकात,चोल राजा करिकलन याने बांधलेला 'अनईकट्ट' अथवा इंग्रजांच्या भाषेत 'ग्रांड अनिकट' (Grand Anicut) किंवा आजच्या बोलीभाषेत 'कलानाई बांध' हा तो बांध आहे.गेली अठराशे वर्षं वापरात असलेला..!!
आजकालच्या धरणांना जिथे तीस-पस्तीस वर्षांत भेगा पडतात तिथे अठराशे वर्षं सतत एखादे धरण वापरात असणं,हे एक अद्भुत आश्चर्य आहे..! नदीच्या मुख्य पात्रात बांधलेला हा बांध किंवा हे धरण ३२९ मीटर्स लांब आणि २० मीटर्स रुंद आहे. त्रिचनापल्लीपासून फक्त १५ किलोमीटर्स दूर असलेला हा बांध,कावेरी नदीच्या डेल्टा प्रदेशात उभारलेला आहे. इंग्रजांनी या धरणावर इंग्रजी संस्कार करण्याचा प्रयत्न केला होता.अत्यंत ओबड-धोबड खडकांनी बांधलेले हे धरण बघून असे निश्चित वाटते की,त्या काळात धरणे बांधण्याचे शास्त्र चांगले विकसित झाले असावे.हे धरण प्रायोगिक तत्त्वावर बांधलेले वाटत नाही,तर कुशल आणि अनुभवी व्यक्तींनी नदीच्या मुख्य प्रवाहात बांधलेले अनुभवसिद्ध धरण वाटते.याचाच अर्थ, आपल्या देशात धरणे बांधण्याचे,म्हणजेच 'जलव्यवस्थापनाचे' शास्त्र फार- फार जुने असावे.अर्थात नंतर झालेल्या विदेशी आक्रमणांमुळे ह्या प्राचीन शास्त्राचे पुरावे नष्ट झाले आणि उरले ते इतिहासात डोकावणारे कलानाई धरणांसारखे गवाक्ष..!
जगाच्या इतिहासात बघितलं तर अत्यंत प्राचीन अशी धरणे बांधल्याचे उल्लेख आढळतात. नाईल नदीवर कोशेश येथे इसवी सनाच्या २९०० वर्षे आधी बांधलेले १५ मीटर उंचीचे धरण जगातील सर्वांत जुने धरण मानण्यात येते.पण आज ते अस्तित्वात नाही.किंबहुना अर्वाचीन इतिहासकारांनी त्या धरणाला पाहिलेलेच नाही. त्याचे फक्त उल्लेख आढळतात.
इजिप्तमधे इसवी सनापूर्वी २७०० वर्षच्या सुमाराला नाईल नदीवर बांधलेल्या धरणाचे काही अवशेष आजही बघायला मिळतात. साद-अल- कफारा असं त्याचं नंतर नामकरण करण्यात आलं.कैरोपासून तीस किलोमीटर अंतरावर बांधलेले हे धरण,बांधल्यानंतर काही दिवसांतच कोसळले.त्यामुळे पुढे अनेक शतकं इजिप्तच्या लोकांनी धरणे बांधण्याची हिम्मतच केली नाही.चीनमधेही इसवी सनापूर्वी २२८० वर्षांपूर्वीच्या धरणांचे उल्लेख सापडतात.मात्र प्रत्यक्षात वापरात असलेलं इतकं जुनं एकही धरण जगभरात आढळत नाही.
भारतात मात्र कलानाई धरणाच्या नंतर बांधलेली आणि वापरात असलेली धरणे आढळतात. इसवी सन ५०० ते १३०० मधे दक्षिणेतल्या पल्लव राजांनी बांधलेल्या अनेक मातीच्या धरणांपैकी काही आजही वापरात आहेत.ते सन १०११ ते १०३७ ह्या काळात तामिळनाडूमधे बांधलेले वीरनाम धरण हे याचे उदाहरण आहे.
जलव्यवस्थापनेच्या संदर्भात बांधलेल्या अनेक रचना आजही अस्तित्वात आहेत.पूर्वी गुजरातची राजधानी असलेल्या 'पाटण' येथे बांधलेली 'रानी का वाव' ही विहीर (राजेशाही बारव) आता युनेस्कोच्या संरक्षित स्मारकांच्या यादीत गेली आहे.भूगर्भातील पाण्याला नीट खेळवण्याचे आणि साठवण्याचे हे एक उत्तम उदाहरण आहे. इसवी सन १०२२ ते १०६३ या काळात बांधण्यात आलेली ही सातमजली विहीर आजही सुस्थितीत आहे.सोळंकी राजवंशाच्या राणी उदयमती यांनी आपले पती भीमदेव यांच्या स्मरणार्थ ही विहीर बांधली होती.म्हणूनच हिचे नाव 'रानी का वाव' अर्थात 'राणीची विहीर' असे पडले.हाच काळ होता,जेव्हा सोमनाथवर महमूद गजनीने आक्रमण केले होते.विहीर बांधल्यानंतर काही वर्षांनी गुजरात हे पूर्णपणे मुस्लीम शासकांच्या ताब्यात गेलं.त्यामुळे पुढे जवळपास सातशे वर्षं ही राजेशाही विहीर चिखलाच्या गाळात दुर्लक्षित होती...!
अर्थात भूमिगत पाण्याच्या व्यवस्थापनाची माहिती आपल्याला फार पूर्वी पासून होती,हे निश्चित.
पंचमहाभूतांच्या मंदिरांसंबंधी या आधीच्या लेखात,याच लेखमालेत,उल्लेख आलेला आहे.त्यातील 'जल' संबंधीचे उल्लेख आणि जलव्यवस्था- पनाची माहिती फार प्राचीन काळापासून आपल्याला होती याचे अनेक पुरावे आपल्या समोर आहेत.ऋग्वेदात,यजुर्वेदात आपल्याला पाण्याच्या नियोजनासंबंधी अनेक सूक्ते आढळतात.धुळ्याच्या श्री.मुकुंद धाराशिवकरांनी यावर विपुल आणि अभ्यासपूर्ण लेखन केलेलं आहे.त्यांनीच प्राचीन जलव्यवस्थापनासंबंधी गो.ग.जोशी यांचाही उल्लेख केला आहे.तारापूरमधे ज्येष्ठ अभियंता असलेल्या जोशी यांचा प्राचीन शास्त्रासंबंधी चांगला व्यासंग होता.
स्थापत्यवेद हा अथर्ववेदाचा उपवेद समजला जातो.दुर्दैवाने त्याची एकही प्रत भारतात उपलब्ध नाही.युरोपमधील ग्रंथालयात याच्या काही प्रती आढळतात.यातील परिशिष्टांमधे तडाग विधी (जलाशयनिर्मिती) ची संपूर्ण माहिती दिलेली आहे.
मुकुंद धाराशिवकरांनी आणखी एका ग्रंथाचा उल्लेख केलाय,ज्याचे नाव दुर्दैवाने उपलब्ध नाही आणि शेवटचे पान नसल्याने तो कोणी लिहिलाय,हे देखील कळत नाही.अथ जलाशया प्रारम्यते... ह्या ओळीने सुरू होणाऱ्या ह्या ग्रंथात भिंत बांधून जलाशय कसा निर्माण करावा याचे सविस्तर वर्णन आहे. हा ग्रंथ २८०० वर्षांपूर्वीचा आहे.
कृषी पाराशर,कश्यप कृषी सूक्त,सहाव्या शतकात लिहिलेल्या 'सहदेव भाळकी' इत्यादी ग्रंथांत पाण्याची साठवण,पाण्याचे वाटप, पावसाचे अनुमान,जलाशय निर्मिती यांवर बरीच आणि सविस्तर माहिती आढळते..
द शिल्पशास्त्र आणि भृगु शिल्पशास्त्र यांत सागरातील किल्ले,नदीतील नारद किल्ले यांसारख्या विषयांपासून ते पाण्याची साठवण, पाण्याचे वाटप आणि पाण्याचा निचरा यावर सखोल विवेचन आढळते.भृगु शिल्पशास्त्रात पाण्याचे दहा गुणधर्म सांगितले आहेत.मात्र पाराशर मुनींनी पाण्याला एकोणीस गुणधर्म असल्याचे प्रतिपादन केले आहे.
पाण्यासंदर्भात वेदांमधे आणि विविध पुराणांमधे अनेक उल्लेख येतात.विशिष्ट परिस्थितीत पाण्याचे नियोजन कसे करावे याबाबत सविस्तर माहिती मिळते.
सन २००७ मधे योजना आयोगाने 'ग्राउंड वॉटर मॅनेजमेंट अँड ओनरशिप' हा रिपोर्ट तज्ज्ञ लोकांद्वारे लिहून प्रकाशित केला.नेटवरदेखील हा उपलब्ध आहे.मोन्टेक सिंह अहलुवालियांची प्रस्तावना ह्या रिपोर्टला आहे.या रिपोर्टच्या सुरुवातीलाच ऋग्वेदातील पाण्यासंबंधीची एक ऋचा वापरली आहे -
The waters of sky,
the waters of rivers,
and water in the well,
whose source is the ocean,
may all these sacred waters protect me.
नंतर रिपोर्ट लिहिण्याची सुरुवात करताना प्राचीन भारतीय शास्त्रानुसार जलव्यवस्थापन हे किती शास्त्रशुद्ध होतं,याचं विवेचन केलं आहे..!
मात्र जलव्यवस्थापनासंबंधी अत्यंत विस्तृत विवेचन केलंय 'वराहमिहिर' ने याचे राहणे उज्जैनला होते.तेव्हा उज्जैनचे महाराजा होते,
'सम्राट विक्रमादित्य' वराहमिहिरने सन ५०५ च्या सुमारास विविध विषयांवरील अभ्यासाला सुरुवात केली आणि सन ५८७ मधे तो वारला. याचाच अर्थ,जवळपास ऐंशी वर्ष वराह मिहिराने ज्ञानसाधनेत खर्च केले.
वराहमिहिराचे प्रमुख कार्य म्हणजे त्याने लिहिलेला 'बृहत्संहिता' नावाचा ज्ञानकोश.या कोशात उदकार्गल (पाण्याची साठवण) नावाचा ५४ क्रमांकाचा अध्याय आहे.१२५ श्लोकांच्या ह्या अध्यायात वराहमिहिरांनी जी माहिती दिली आहे,ती अद्भूत आहे,अक्षरशः थक्क करणारी आहे.
भूगर्भामधे पाण्याचा शोध कसा घेता येऊ शकतो,यासंबंधीचे श्लोक आहेत,जे आजही आपल्याला चकित करतात.वराहमिहिराने जमिनीच्या आतील पाणी शोधताना मुख्यतः
तीन गोष्टींच्या निरीक्षणावर भर दिलेला आहे. त्यात त्या भागात उपलब्ध असलेली झाडं, झाडांजवळ असलेली वारुळे,त्या वारुळाची दिशा,त्यात राहणारा प्राणी आणि तिथल्या जमिनीचा रंग,पोत आणि तिची चव यांचा समावेश आहे..! या निरीक्षणांच्या आधारे जमिनीच्या आतील पाणी नक्की शोधता येईल असे त्याचे म्हणणे आहे.
लक्षात घ्या,दीड हजार वर्षांच्याही आधी,काहीही आधुनिक संसाधने माहीत नसताना,वराहमिहिर हे ठाम प्रतिपादन करतोय..!!
मात्र हे सर्व करताना वराहमिहिराने आजच्या वैज्ञानिकांसारख्या नोंदी करून ठेवल्या,ज्या महत्त्वपूर्ण आहेत.त्याने पंचावन्न वृक्ष व वनस्पतींचा अभ्यास करून मांडणी केली आहे. त्याचप्रमाणे त्याने मातीचे वर्गीकरण देखील विस्ताराने केले आहे.ह्या सर्व निरीक्षणांचे निकषही त्याने मांडून ठेवले आहेत. त्यांतील काही -
१. भरपूर फांद्या तेलकट साल असलेले ठेंगणे झाड असेल तर पाणी आढळते.
२. उन्हाळ्यात जमिनीतून वाफा येताना दिसल्या तर पृष्ठभागाजवळ पाणी असते.
३. झाडाची एकच फांदी जमिनीकडे झुकलेली असेल तर तिच्या खालील भागात पाणी आढळते.
४. जेव्हा जमीन गरम झालेली असते तेव्हा एखाद्याच ठिकाणी ती थंड लागली तर तिथे पाणी असते.
५. काटेरी झाडांचे काटे बोथटलेले असतील तर हमखास पाणी मिळते....
वगैरे,अशी अनेक निरीक्षणे त्याने नोंदवलेली आहेत. खरी गंमत तर पुढेच आहे.
वराहमिहिराचे हे प्रतिपादन खरं की खोटं,हे ठरविण्यासाठी आंध्र प्रदेशातल्या तिरुपतीमधल्या श्रीवेंकटेश्वर (एस.व्ही.) विद्यापीठाने सुमारे पंधरा-सोळा वर्षांपूर्वी प्रत्यक्ष विहिरी खोदून पाहायचे ठरविले.वराहमिहिराच्या निरीक्षणानुसार पाणी मिळण्यास योग्य ठरतील अशा जागा निवडल्या आणि सुमारे ३०० बोअर घेतले.
(बोअरवेल खणल्या) आश्चर्य म्हणजे ९५% ठिकाणी पाणी लागले.
अर्थात वराहमिहिराचे निरीक्षण योग्य होते हे सिद्ध झाले.मात्र पुढे दुर्दैवाने हा प्रकल्प सरकारी लालफीतशाहीत अडकला आणि तो लोकांपर्यंत पोहोचू शकला नाही..!
पाण्याच्या व्यवस्थापनाची अनेक उदाहरणं आपल्याला इंग्रजाचे शासन येण्याच्या आधीपर्यंत ठिकठिकाणी दिसतात.अगदी उत्तर पेशवाईत औरंगाबाद येथे बांधलेले 'थत्ते नहर' असो, की पुण्याला पेशव्यांच्या काळात केलेली पाणीपुरवठ्याची रचना असो.बऱ्हाणपूरला आजही अस्तित्वात असलेली,पाचशे वर्षांपूर्वीची पाणी वाहून नेण्याची रचना असो,की पंढरपूर-अकलूज रस्त्यावरील वेळापूर गावात सातवाहन कालीन बांधलेली बारव असो. 'समरांगण सूत्रधार' ह्या ग्रंथाच्या आधाराने राजा भोजने बांधलेला भोपाळचा मोठा तलाव असो... अशी कितीतरी उदाहरणं देता येतील.
गढा-मंडला (जबलपूर संभाग) आणि चंद्रपूर या भागात प्राचीन काळापासून गोंडांचं राज्य होतं. अगदी मुगलांना,आदिलशाहीला किंवा कुतुबशाहीला सुद्धा त्यांना जिंकता आलं नव्हतं. मात्र तरीही आपल्या देशात हा प्रदेश म्हणजे मागासलेला मानला गेला.अर्थात खरं चित्र तसं नव्हतं.एक खूप सुरेख हिंदी पुस्तक आहे- 'गोंडकालीन जल-व्यवस्थापन'यात सुमारे पाचशे ते आठशे वर्षांपूर्वी गोंड साम्राज्यात किती उत्कृष्टपणे पाण्याचं नियोजन केलं होतं याचं वर्णन आहे.या नियोजनाचा फायदा म्हणजे कुठल्याही दुष्काळाची किंवा अवर्षणाची झळ ह्या गोंड प्रदेशाला कधीही लागली नाही.
आमच्या जबलपूर शहरात गोंड राणी दुर्गावतीच्या काळात (अर्थात पाचशे वर्षांपूर्वी) 'बावनताल आणि बहात्तर तलैय्या' बांधले गेले (तलैय्या- लहान तलाव).हे तलाव नुसतेच खोदून बांधले गेले नव्हते,तर जमिनीच्या 'कंटूर' प्रमाणे त्यांची रचना आहे.काही तलाव तर आतून एक-दुसऱ्याशी जोडले गेलेले आहेत.आज त्यांतले अनेक बुजले असूनही उरलेल्या तलावांमुळे जबलपूरमधे,अगदी आजही पाण्याची पातळी बऱ्यापैकी चांगली आहे आणि येथे पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवत नाही.मग त्या काळात पाण्याची,शेतीची आणि निसर्गाची काय समृद्धी असेल..!!
याचाच अर्थ,पाण्याचे महत्त्व,पाण्याचा शोध आणि पाण्याचे नियोजन याचे संपूर्ण विकसित तंत्रज्ञान आपल्याजवळ होते.काही हजार वर्षांपासून आपण ते प्रभावी पद्धतीने वापरत होतो.आणि म्हणूनच आपला देश खऱ्या अर्थाने सुजलाम सुफलाम होता..!
मात्र आपल्यापैकी अनेकांच्या मनावर इंग्रजांचे असे जबरदस्त गारुड आहे की अनेकांना आज ही असे वाटते की आपल्या देशात पाण्याचे महत्त्व ओळखले ते इंग्रजांनी.आपल्याला धरणे बांधायला शिकवले ते इंग्रजांनी..!
दुर्दैवाने आपण आपलं प्राचीन जलव्यवस्थापन विसरलो अन् आज पाण्यासाठी आपण त्राही-त्राही करतोय,१४४ कलमं लावतोय,युद्ध खेळतोय..!!
आपल्यालाच आपल्या समृद्ध ज्ञानाचा,वारशाचा आणि तंत्रज्ञानाचा विसर पडला तर हे असं होणं अटळ आहे..!!
९ डिसेंबर २०२३ ला लेखातील पुढील भाग..