..वरील वाक्याची सत्यता पटवून देणारी कथा नुकतीच वाचणात आली.
सून फोनवर आईशी बोलत होती,"आई मी काय सांगू,आजकाल शिळ्या कढीला पण उत आलाय !सासरेबुवा निवृत्त झाल्यापासून,
दोघेही गार्डनमध्ये एखाद्या फिल्मी जोडप्यासारखे दिवसभर झोपाळ्यावर बसलेले असतात.आपल्या पिकल्या केसांकडे बघून तरी वागायचं त्यांनी ! अजूनही स्वतःला पंचवीशीतलेच समजतात.
तेवढ्यात उदास मनाने सासूबाई स्वयंपाकघरात शिरल्या.त्यांनी हे सर्व ऐकले होते,पण त्याकडे दुर्लक्ष करून त्यांनी शांतपणे चहा बनवला आणि सुनेलाही तिच्या खोलीत जाऊन दिला.
नवऱ्यासाठी चहा घेऊन जाताना सुनेने पाहिलं अन् पुन्हा तोंड वेडंवाकडं केलं.पण त्यांनी तिच्याकडे दुर्लक्षच केलं.
पती निवृत्त झाल्यापासून हा आता त्यांचा रोजचाच दिनक्रम झाला होता.त्यांच्या इच्छेनुसार ती रोज चांगले चांगले कपडे घालून गार्डनमध्येच आपला बराचसा वेळ घालवायची.
आयुष्यभर त्यांनी फक्त मुलासाठीच खस्ता खाल्ल्या होत्या. त्यामुळे आयुष्याच्या संध्याकाळी,ते दोघेही एकत्र वेळ घालवायचे.
अन्नपूर्णा भवन… दोन मजली बंगलेवजा घर अशोक आणि प्रभा यांचे आजीवन स्वप्न होते. घराच्या समोर असलेल्या बागेत प्रभाबाईंनी बेल,जास्वंदी,चाफा,मोगरा अशी कितीतरी फुलझाडे लावली होती.एका छोट्या टाकीत छानशी कमळेही फुलली होती.हिवाळ्यात त्या तेथे भाज्यांचीही लागवड करत.स्वयंपाकघरासाठी लागणारी ताजी कोथिंबीर,पुदिना,मेथी तिथलीच असायची!
पण इतकी वर्षे कामाच्या गडबडीत अशोकजींना त्या जागेचा कधीच आनंद घेता आला नाही.पण आता मात्र त्यांचा सगळा मोकळा वेळ तिथेच जात असे.खरं तर त्या जागेत एक छानसं टुमदार घर दोघांसाठी बनवायचं म्हणून ती अतिरिक्त जागा त्यांनी घेतली होती.पण आता ते शक्य नव्हतं. प्रभाबाईंना तिथे एक झोपाळा हवा होता तो त्यांनी आणला.आता त्यांचा बराचसा वेळ त्या झोपाळ्यावर गप्पा मारण्यातच जायचा.
आता पती-पत्नी दोघांनाही आरामाचे क्षण जगायचे होते.त्यांच्या घरात सर्व आवश्यक सोयीसुविधाही होत्या,तरीही सूनेला त्यांचं हे दिवसभर झोपाळ्यावर बसणं खटकायचं.अगोदर दिवसभर तिच्यासोबत असलेल्या सासूबाई आता त्यांच्या पतीला थोडा अधिक वेळ देऊ लागल्या होत्या.
त्यांना टोमणे मारायची एकही संधी ती सोडत नसे.एकदा त्यांना त्या जागेतून हटवण्यासाठी तिने एक युक्ती केली.
"आपण मोठी कार का खरेदी करत नाही ... नवीन"
"कल्पना चांगली आहे,पण ठेवायची कुठे? आपल्याकडे फक्त एकच गॅरेज आहे." नवीन थोड्या चिंतेच्या स्वरात म्हणाला.
"जागा का नाही,ती बाग आहे ना ! जिथे आजकाल दोन लव्हबर्ड्स बसतात!"
"तू जरा जास्तच बोलतेस!" म्हणत नविनने तिला फटकारले खरे,पण त्यानेही याबाबत बाबांशी बोलायचे ठरवले होते.
दुसऱ्या दिवशी संध्याकाळी तो वडिलांकडे गेला आणि म्हणाला,"बाबा! मला आणि सोनमला मोठी कार घ्यायची आहे."
"पण बेटा,मोठी गाडी आधीच घरात आहे,मग तू ती ठेवणार कुठे?"
"या बागेतच नवं गॅरेज बांधायचा विचार करतोय मी सोनम काही बघणार नाही आणि आई तरी अजून किती दिवस काळजी घेईल ? त्यापेक्षा ही झाडे तोडणे चांगले होईल."
प्रभाबाईंच्या छातीत ते ऐकून धस्स झालं ! रागावर नियंत्रण ठेवत बाबा म्हणाले,"मला तुझ्या आईशी बोलावं लागेल,मला थोडा वेळ दे."
"काय पप्पा ... आईला काय विचारायचे .. या जागेचा काय उपयोग ?",नवीन जरा चिडूनच म्हणाला.
"तुम्ही दोघेही दिवसभर कुठलाही विचार न करता,चार लोकांचा विचार न करता इथे बसता.आता सोनम सुद्धा घरात आहे,लहान मुलंही आहेत.पण तुम्ही मात्र दोघेही दिवसभर झोपाळ्यावर डुलता."
आतून सोनमची बडबड चालूच होती.
नवीन आणि सोनमने त्या संध्याकाळी बाहेरून जेवण मागवले.पण ते जेवण काही केल्या या दोघांच्याही घशाखाली उतरले नाही.इच्छाच नव्हती कसली.दोघेही रात्रभर जागेचं होते!
पण सकाळी त्याबद्दल विचार करताना,बाबांच्या ओठांवर एक स्मित उमटले.त्यांनी स्वयंपाकघरात जाऊन स्वतःच चहा बनवला.पण खूप निराश झालेल्या प्रभाताई त्या दिवशी झाडांना पाणी देण्यासाठी बाहेर पडल्या नाहीत, किंवा कोणाशीही बोलल्या नाहीत.
दिवसभर सर्वकाही सामान्य होते,पण संध्याकाळी,'घर भाड्याने देणे आहे' असा बोर्ड घराबाहेर लटकलेला पाहून नवीनने गोंधळलेल्या आवाजात बाबांना विचारले,"पप्पा, घर मोठे आहे हे मान्य,पण हे काय"?
"पुढच्या महिन्यात माझ्या स्टाफमधले मिस्टर गुप्ते सेवानिवृत्त होत आहेत,ते या घरात राहतील",त्यांनी शांतपणे उत्तर दिले.
"पण कुठे?"
"तुमच्या भागात",अशोकजींनी साध्या
आवाजात उत्तर दिले.
"आणि आम्ही?"
"तुम्ही तुमच्या पायावर उभे राहू शकाल इतके सक्षम तर मी तुम्हाला बनवलेच आहे.दोन तीन महिन्यांत तुम्ही दुसरा फ्लॅट पाहा किंवा कंपनीच्या फ्लॅटमध्ये राहण्यासाठी जा,जिथे तुम्ही तुमच्या वयाच्या लोकांबरोबर राहू शकाल !
आम्ही दोघेही आमच्या वयाच्या लोकांमध्ये राहू.तुमच्या आईचं संपूर्ण आयुष्य तुम्हा सर्वांची काळजी घेण्यात गेले.आता तुमच्याकडून शहाणपणाचे धडे शिकणे एवढंच बाकी होतं."
"बाबा,मला असे म्हणायचे नव्हते," नवीन हात जोडत म्हणाला.
"नाही बेटा,तुझ्या पिढीने आम्हालाही व्यावहारिक होण्याचा धडा दिला आहे.जर आम्ही दोघे तुम्हा दोघांना एकत्र पाहून आनंदीत होऊ शकतो तर मग तुम्हाला आमच्यापासून त्रास का होतो?हे घर तुझ्या आईने बांधले आहे, हे झाड,ही फुले तुमच्यासाठी भोगलेल्या अनंत कष्टांचे साक्षीदार आहेत,म्हणून मी कोणालाही तिचा हक्काचा कोपरा हिसकावण्याचा अधिकार देणार नाही."
"बाबा, तुम्ही गंभीर झालात",नवीनचा आवाज आता हळवा झाला होता.
"नाही बेटा ... तुझ्या आईने आजवर खूप त्याग करून,खूप दुःख सहन करून मला पाठिंबा दिला.आज तिच्या कृपेने माझ्या डोक्यावर कोणतेही कर्ज नाही.म्हणूनच फक्त हा कोपराच नाही,संपूर्ण घर तिचे ऋणी आहे.तुमच्यापेक्षा तिचा या घरावर अधिक हक्क आहे.
आमची मुलं असल्याचा फायदा जरूर घ्या.पण जर देव मंदिरात जोडीने शोभून दिसतात तर आईवडील का दिसू नये?
मानवी भावभावना संवेदना जपणाऱ्या सर्वांना मनस्वी समर्पित…
लेखक - अनामिक