* विजय गायकवाड | Vijay Gaikawad: भाऊबीजेचा दिवस..

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

भाऊबीजेचा दिवस.. लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
भाऊबीजेचा दिवस.. लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

२४/१०/२२

भाऊबीजेचा दिवस..

मंगळवार असल्यामुळे मी नेहमीप्रमाणे कवठेमंहाकाळला गेलो होतो. माझी कवठेमहांकाळची व्हिजिट मला नेहमीच आवडते... त्याला कारण की ती साधीभोळी खेडूत माणसं.

एक म्हातारा आणि एक म्हातारी आत आली. म्हातारीने म्हातार्‍याला हात धरून आणलं आणि खुर्चीवर बसवलं.

" बस हितं." ती बोलली.

" काय होतंय आजोबा? " मी विचारलं.

" हाता पायाला आग लागल्या ह्याच्या." म्हातारी बोलली.

" आग लागल्या म्हणजे खाजतंय की जाळ उठतोय?" मी विचारलं.

" जाळ उठतोय. रात भर पाण्यात पाय बुडवू कि तोंडात हात घालू असं करतोय ह्यो." म्हातारी

" कधीपासून ? "

" वरीस सहा म्हैने झालं असणत्याल की ! "

मी बघितलं. त्याच्या अंगावर काही उठलेलं दिसत नव्हतं. तळहात तळपाय ही व्यवस्थित होते. ग्लुकोमीटरच्या सहाय्याने शुगर बघितली तरी ती साडेचारशे.

" जेवण झालंय ? " मी विचारलं

" व्हय ... इंजेक्शन घ्यायला लागलं तर चक्कर यायला नको म्हणून मीच बळबळ खायला घालून आणलंय." म्हातारी बोलली.

" किती वेळ झाला असेल जेवण करून ? " मी विचारलं

" दीड दोन घंट झालं असत्याल की ! "

" होय काय ?..यांची साखर वाढलेली आहे."

" व्हय ? "

" होय,अगदी तीनपट."

"आर देवा,आता काय करायचं ? म्हातारी घाबरून बोलली."आता काय कराव लागलं वं?"

" गोडधोड सगळं बंद करावं लागेल."

मी तिला डायबेटिक लोकांचं पथ्य आणि त्यांचा आहार समजावून सांगितला.औषधं लिहून दिली आणि पुढच्या मंगळवारी येण्यास सांगितलं.

" मावशी,कोण आहेत हे ?.. तुमच्यापेक्षा वयान कमी वाटतात म्हणून विचारलं." मी म्हटलं.

" माझ्यापरास ल्हानच हाय त्यो !" म्हातारी बोलली,"माझ्या पाठीवरचा भाऊ हाय. माझ्या लग्नापासंन माझ्याकडंच हाय."

" होय ? "

" डोसक्यानं जरा कमी हाय पर माझ्यावर लै जीव हाय.माझ्या लग्नात आठ धा वर्साचा असंल.... माझं लगीन लागल्यावर दोन वर्सानं ज्यो माज्याकडं आलो तो पुन्हा घरला गेलाच न्हाई."

" काय सांगता ? "

" व्हायचं की !..आमचा बाप मेला तवा चार दिस गेला असंल तेवढाच.थोरलं पोरंगच समजून मोठं केलयं मी त्येला.. लै गुणाचा ! ..कवा कवा तरच डोस्कं फिरल्यागत करतोय.आज सकाळी ओवाळायला जरा उशीर झाला तर बसला लगीच रुसून ! ओवाळल्यावर मग हरकला.कपाळावर नाम बी मोठा लावायला पाहिजे ! ... बघा की केवढा नाम लावलाय ? कपाळभरुन." म्हातारीनं मोठ्या कौतुकानं आपल्या भावाकडे बघितलं. मग बोलली," आता तुम्ही रगात तपासायला टोचलंय की नाही,तर सांजच्यापातुर रुसून बसलं बघा."

" यांचं लग्न ? "

" न्हाय वं ! ... खुळा कावरा हाय भाऊ माजा,कोण द्याचं पोरगी ह्याला ? 

.... घास मुटका खाऊन जगतोय तेच बास झालं. मी हाय तवर तरी याची काही फिकीर न्हाई."

" आणि तुमच्या माघारी ? "

" ते त्या पांडुरंगाला कोडं !..


सगळ्या बहिणी आपल्या भावाला बक्कळ औक्ष मिळू दे म्हणत्यात... मी मातूर माझ्या भावा पेक्षा मला जास्त औक्ष मिळू दे म्हणत्या... का माहिताय?

... कारण मला माहित हाय मी हाय तर माझा भाऊ हाय." बोलता बोलता म्हातारीच्या डोळ्यात पाणी आलं. तिनं आतापर्यंत आमचं बोलणं लहान मुलासारखं ऐकणाऱ्या आपल्या भावाचा हात धरला आणि 'चल रं !' म्हणून ती चालु लागली. मी मात्र त्या जगावेगळ्या बहिणीच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत होतो..!


 डॉ.अशोक माळी यांच्या "माणसं" या  पुस्तकातून..!