* विजय गायकवाड | Vijay Gaikawad: जानेवारी 2023

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

३०/१/२३

भारतीय स्थापत्यशास्त्र - २

एखाद्या वस्तूची वॉरंटी,गॅरंटी किंवा हमी किती असू शकते? एक वर्ष,दोन वर्षं,पाच वर्षं,दहा वर्षं...? आपली झेप यापलीकडे जात नाही नं..? 


पण निर्माण किंवा स्थापत्य क्षेत्रातल्या भारतीय तंत्रज्ञांनी तयार केलेल्या विटेची गॅरंटी आहे,हमी आहे - ५,००० वर्षे..! होय.पाच हजार वर्षं.अन् ह्या विटा आहेत मोहन-जो-दारो आणि हडप्पा येथे सापडलेल्या पुरातन संस्कृतीच्या अवशेषांमधल्या !


भारतात जेव्हा १८५७ च्या पहिल्या स्वातंत्र्ययुद्धाची तयारी चाललेली होती,त्या काळात भारताच्या उत्तर पश्चिमेला (म्हणजे आजच्या पाकिस्तानात) इंग्रज रेल्वेचं जाळं उभं करण्याच्या खटपटीत होते.लाहोर ते मुलतान ही रेल्वे लाईन टाकण्याचं काम ईस्ट इंडिया रेल्वे कंपनीतर्फे चालू होत.या कामाचे प्रमुख होते जॉन आणि विलियम ब्रुनटन हे ब्रिटिश अभियंते यांच्या समोर मोठं आव्हान होतं की,रेल्वे लाईनच्या खाली टाकण्यासाठीची खडी (गिट्टी) कुठून मिळवावी हे.


काही गावकऱ्यांनी त्यांना सांगितले की, ब्राम्हनाबाद जवळ एक पुरातन शहर 'खंडहर' झालेल्या स्थितीत पडलंय.तिथल्या विटा तुम्हाला मिळू शकतील.


रेल्वे अभियंता असलेल्या ह्या दोघा भावांनी मग त्या अवशेषांमधल्या विटा शोधून काढल्या.त्या बऱ्याच होत्या.

लाहोर ते कराची ह्या सेगमेंटमधील रेल्वे लायनीत जवळपास ९३ किलोमीटरची लाईन ही या विटांनी बांधली गेली आहे.


या दोघा अभियंत्यांना हे कळलंच नाही की, एका अतिशय पुरातन आणि समृद्ध अशा हडप्पाच्या अवशेषांना आपण नष्ट करत आहोत!


पुढे बरीच वर्षं ह्या ऐतिहासिक विटांनी लाहोर-मुलतान रेल्वे लाईनला आधार देण्याचं काम केलं.


नवीन झालेल्या कार्बन डेटिंगच्या शोधाने हे सिद्ध झालंय की मोहन- जो-दरों,हडप्पा,लोथल इत्यादी ठिकाणची आढळलेली पुरातन संस्कृती ही साडेसात हजार वर्षं जुनी असावी. ह्या विटा जरा अलीकडल्या म्हटल्या तरी त्या पाच हजार वर्षं जुन्या होतात.अशा ह्या किमान पाच हजार वर्षं जुन्या विटा,१८५७ साली मिळाल्या तेव्हाही मजबूत असतात आणि त्या पुढे ८० / ९० वर्षं रेल्वेचे रूळ सांभाळण्याचं काम करतात...!! आज अशा विटा बनू शकतील..?


हडप्पा येथे सापडलेल्या ह्या विटा वैशिष्ट्यपूर्ण आहेत.ह्या भट्टीत व्यवस्थित भाजलेल्या आहेत. 


साधारण १५ वेगवेगळ्या आकारांत ह्या आढळतात.पण ह्या सर्व आकारांत एक साम्य आहे ह्या सर्व विटांचं - प्रमाण हे ४ : २: १ असं आहे. म्हणजे ४ भाग लांबी, २ भाग रुंदी आणि १ भाग उंची (जाडी). याचाच अर्थ ह्या विटा अत्यंत वैज्ञानिक पद्धतीने तयार झाल्या असाव्यात.मग प्रश्न निर्माण होतो की,साधारण पाच ते सात हजार वर्षांपूर्वी हे बांधकामशास्त्रातलं प्रगत ज्ञान आपल्या भारतीयांजवळ कुठून आलं.. ? की भारतानंच हे शोधून काढलं ?


याचं काहीसं उत्तर आपल्याला जुन्या संस्कृत ग्रंथांमध्ये मिळतं.


तंत्रशास्त्राचे काही ग्रंथ वाचिक परंपरेमुळे आज उपलब्ध आहेत.त्यातील कपिल वात्सायनाचा ग्रंथ आहे.'मयमतम कला- मुला शास्त्रं' नावाचा.हा ग्रंथ बांधकामासंदर्भातील अनेक बाबी स्पष्ट करतो. यातील एक श्लोक आहे


'चतुष्पश्चषडष्टाभिमत्रिस्तद्विद्विगुणायतः ॥ व्यासार्धार्धत्रिभागैकतीव्रा मध्ये परेऽपरे ।

इष्टका बहुशः शोष्याः समदग्धाः पुनश्च ताः।।'


याचा अर्थ आहे -'ह्या विटांची रुंदी चार,पाच, सहा आणि आठ ह्या नंतर भाजून घटकांमधे असून लांबी ह्याच्या दुप्पट आहे.ह्यांची उंची (जाडी) ही रुंदीच्या एक द्वितीयांश किंवा एक तृतीयांश असावी.ह्या विटा वाळवून घ्याव्यात.'


हा श्लोक ज्या ग्रंथात आहे,तो ग्रंथ लिहिला गेलाय इसवी सनाच्या सहाव्या शतकात. म्हणजे आजपासून साधारण दीड हजार वर्षांपूर्वी. आणि हडप्पामध्ये याच प्रमाणात/ आकारात सापडलेल्या विटा आहेत पाच ते सात हजार वर्षं जुन्या.


याचा अर्थ स्पष्ट आहे.बांधकामशास्त्रातलं अत्यंत प्रगत असं ज्ञान ज्ञात इतिहासाच्या काळापासून भारताजवळ होतं आणि ते शास्त्रशुद्धरीत्या वापरलं जात होतं.


एक तुलनेनं अलीकडचं उदाहरण घेऊ. विजयनगर साम्राज्याच्या उत्तर काळात,म्हणजे सन १५८३ मधे बांधलं गेलेलं लेपाक्षी मंदिर. असं सांगितलं जातं की,जटायूने सीतेचं हरण करणाऱ्या रावणाबरोबर संघर्ष करून येथेच देह ठेवला होता.बंगलोरपासून दीडशे किलोमीटर अंतरावर,पण आंध्र प्रदेशाच्या अनंतपूर जिल्ह्यात असलेलं हे मंदिर अनेक अर्थांनी वैशिष्ट्यपूर्ण आहे.विजयनगर साम्राज्याच्या वीराण्णा आणि विरूपण्णा ह्या दोन सरदार भावंडांनी हे मंदिर बांधलेय.कूर्मशैल पठारावर म्हणजे कासवाच्या पाठीच्या आकाराच्या टेकडीवर बांधलेले हे मंदिर वीरभद्राचे आहे.सुमारे सव्वापाचशे वर्षं जुने हे मंदिर मात्र एका वेगळ्याच कारणासाठी प्रसिद्ध आहे.


सत्तर खांबांवर आधारलेल्या ह्या मंदिराचा एक खांब हा झुलता आहे..! अर्थात तो तसा वाटत नाही.जमिनीवर टेकलेलाच वाटतो.मात्र त्याच्या खालून पातळ कापड आरपार जाऊ शकते.वरती बघितलं तर त्याला बांधून ठेवणारी अशी कोणतीही रचना तेथे दिसत नाही.


बांधकामशास्त्रातल्या दिग्गजांना आणि शास्त्रज्ञांना सतावणारे हे गूढ आहे.हा खांब (स्तंभ) कोणत्याही आधाराविना झुलता कसा राहतोय हे कोणालाही सांगता येत नाही. इंग्रजांचे शासन असताना एका इंग्रज अभियंत्याने ह्या खांबावर बरेच उपद्व्याप करून बघितले.पण त्यालाही ह्या रचनेचे रहस्य शोधता आले नाही.


म्हणजेच पाचशे वर्षांपूर्वीपर्यंत भारतात बांधकामशास्त्रातले हे प्रगत तंत्रज्ञान उपलब्ध होते.पुढेही ते अनेक ठिकाणी दिसते. 


प्रतापगड आणि रायगड तर शिवाजींच्या काळातच बांधले गेले.पण इंग्रजांनी मुद्दाम केलेली पडझड सोडली तर आजही हे किल्ले बुलंद आहेत.


पण नंतर इंग्रजांनी आपले सिव्हील इंजिनिअरिंग भारतात आणले आणि 


स्थापत्य / बांधकामशास्त्रातील थोडेफार उरलेले भारतीय ग्रंथ बासनात गुंडाळले गेले आणि अडगळीत पडले.


भारतीय शिल्पशास्त्राचे (किंवा स्थापत्यशास्त्राचे) अठरा प्रमुख संहिताकार मानले जातात.ते म्हणजे भृगु,अत्री,वसिष्ठ,विश्वकर्मा,मय,नारद, नग्नजीत,

विशालाक्ष,पुरंदर,ब्रम्हा,कुमार,नंदिश, शौनक,

गर्ग,वासुदेव,अनिरुद्ध,शुक्र व बृहस्पती. या प्रत्येकाची शिल्पशास्त्रावरील स्वतंत्र अशी संहिता होती.मात्र आज फक्त मय,विश्वकर्मा,भृगु,नारद आणि कुमार यांच्याच संहिता उपलब्ध आहेत.अर्थात शिल्पशास्त्रातील एक तृतीयांशपेक्षाही कमी ज्ञान आज उपलब्ध आहे.इतर संहिता मिळाल्या तर कदाचित लेपाक्षी मंदिरातील झुलणाऱ्या खांबाच्या रहस्यासारखी इतर रहस्ये उघडकीला येतील.


भारतात उत्तरेकडून ज्या काळात मुसलमानांच्या आक्रमणांची तीव्रता वाढली,त्याच काळात, म्हणजे ११ व्या शतकात,माळव्याचा राजा भोज याने 'समरांगण सूत्रधार' हा ग्रंथ संकलित केला. यात ८३ अध्याय आहेत.आणि स्थापत्य - शास्त्रापासून ते यंत्रशास्त्रापर्यंत अनेक बाबींचे विस्तृत विवरण आहे.अगदी हायड्रोलिक शक्तीने टर्बाईन चालविण्याचा विधीही यात दिलेला आहे-


'धारा च जलभारश्च पायसो भ्रमणम तथा । यथेोच्छ्रायो यथाधिक्यम यथा निरन्ध्रतापिच । एवमादिनी भूजस्य जलजानीप्रचक्षते' ।। अध्याय ३१


अर्थात जलधारा वस्तूला फिरवते.आणि उंचावरून जलधारा पडली तर तिचा प्रभाव अधिक तीव्र असतो आणि तिच्या वेगाच्या आणि वस्तूच्या भाराच्या प्रमाणात वस्तू फिरते.


या समरांगण सूत्रधारावर युरोपमधे बरेच काम चालले आहे.मात्र आपल्या देशात या बाबतीत उदासीनताच दिसून येते.साधारण ८० च्या वर वय असलेल्या डॉ. प्रभाकर पांडुरंग आपटे यांनी या ग्रंथाचा चिकाटीने इंग्रजीत अनुवाद केला अन् पाश्चात्त्य जगाचे लक्ष या ग्रंथाकडे गेले.


हे असं स्थापत्यशास्त्रावरचं ज्ञान प्रचंड मोठ्या प्रमाणात अडगळीत पडलंय.त्याला बाहेर आणणं आवश्यक आहे.मंदिर स्थापत्यशास्त्र आणि मूर्तिकला या विषयांवर आपल्यापर्यंत झिरपत आलेलं साहित्य मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे.इतिहाससंशोधक ग. ह. खरे यांचं 'भारतीय मूर्तिविज्ञान' या नावाचं अप्रतिम पुस्तक आहे.पण या विषयावर आजच्या काळात बरंच काम होणं आवश्यक आहे.


एकुणात काय,तर हजारो वर्षांपूर्वी आपल्या पूर्वजांनी लिहून ठेवलेल्या ज्ञानाची कवाडं शोधणं आणि ती उघडणं याचाच हा सारा प्रवास आहे..!


२८ जानेवारी २०२३ या लेखातील पुढील भाग…

२८/१/२३

भारतीय स्थापत्यशास्त्र - १

जगातलं सर्वांत मोठं पूजास्थल कोणतं,असा प्रश्न विचारला की साधारणपणे त्याचं उत्तर हे व्हेटिकन सिटीमधलं एखादं चर्च / बेसिलिका किंवा स्पेनमधलं चर्च किंवा मस्कतची मशीद वा मक्का यांसारखी उत्तरं समोर येतात.पण जगातलं सर्वांत मोठं पूजास्थल हे हिंदूंचं मंदिर आहे हे अनेकांना माहीत नसतं.आणि हे मंदिर भारताबाहेरचं आहे ही माहिती तर बहुतेकांना नसतेच !


 कंबोडियाच्या उत्तर-पश्चिम सीमेवर असलेलं 'अंगकोर वाट' हे मंदिर म्हणजे जगातील सर्वांत मोठे पूजास्थल आहे.दक्षिणपूर्व आशियात 'वाट' चा अर्थ 'मंदिर' होतो.कित्येक मैल पसरलेल्या ह्या मंदिरात बांधलेली एक भिंतच मुळी साडेतीन किलोमीटर लांब आहे.मेरू पर्वताच्या प्रतिकृतीप्रमाणे बनविलेल्या ह्या मंदिराच्या आतील बांधकामाची लांबी-रुंदी दीड किलोमीटर बाय दीड किलोमीटर आहे.ह्या मंदिराचा एकूण परिसर चारशे चौरस किलोमीटर पसरलेला आहे.


ह्या मंदिराचं महत्त्व किती आहे? तर कंबोडियाच्या राष्ट्रध्वजात ह्या हिंदू मंदिराला जागा दिलेली आहे.हे मंदिर आपल्या देशाच्या हद्दीत रहावं म्हणून काही वर्षांपूर्वी कंबोडिया आणि थायलंड ह्या देशांमध्ये भलं मोठं युद्ध भडकणार होतं.युनेस्कोने ह्या मंदिराचा 'जागतिक वारशांच्या यादीत' समावेश केलेला आहे.आणि जगभरातल्या पर्यटकांच्या दृष्टीने हे अत्यंत महत्त्वाचं आणि प्रेक्षणीय स्थळ आहे.


इसवी सन अकराशेच्या प्रारंभीच्या काळात ह्या मंदिराचे निर्माण झाले आणि अकराशेच्या मध्यावर ते पूर्ण झाले.त्या काळात हा प्रदेश 'कंबोज प्रांत' म्हणून ओळखला जात होता.


जावा,सुमात्रा,मलाया,सुवर्णद्वीप,सिंहपूर हा संपूर्ण प्रदेश हिंदू संस्कृतीच्या प्रभावाखाली होता.कंबोजचा तत्कालीन राजा सूर्यवर्मा (द्वितीय) ने ह्या विष्णू मंदिराचे निर्माण केले. मुळात हे एक मंदिर नाही,तर हा मंदिरांचा समुच्चय आहे.संस्कृतमधे 'अंगकोर'चा अर्थ होतो - मंदिरांची नगरी.मंदिरांचा भव्य परिसर एका चौकोनी कालव्यामुळे किंवा खंदकामुळे सुरक्षित राहील अशी रचना केलेली आहे.ह्या खंदकावरचा पूल पार करून आपण मंदिरात प्रवेश करू लागलो की,एका एक हजार फूट रुंदीच्या,अक्षरशः भव्य-दिव्य अशा प्रवेशद्वाराने आपले स्वागत होते.ह्या मंदिरांच्या भिंतींवर रामायणातले प्रसंग कोरून ठेवलेले आहेत. समुद्रमंथनाचे अद्भुत दृश्य अनेक मूर्तीच्या मदतीने साकारलेले आहे.अंगकोरचे जुने नाव यशोधपुर होते.नंतर मात्र ह्या विशाल मंदिरांमुळे ते अंगकोर झाले.


ह्या मंदिराचे स्थापत्यशास्त्र आणि संपूर्ण मंदिर परिसराची रचना बघून मन थक्क होतं. 


सुमारे ९०० ते १,००० वर्षांपूर्वी इतके अचूक बांधकाम करणे त्या काळच्या हिंदू स्थापत्यकारांना कसे शक्य झाले असेल? ह्या मंदिराची केंद्रीय संरचना बघून हे अनुमान निश्चित काढता येतं की,त्या काळी मंदिर बांधण्यापूर्वी,ह्या मंदिर परिसराचे नकाशे काढले गेले असतील.त्यात 'सिमेट्री' साधली गेली असेल,अन् त्याप्रमाणेच नंतर निर्माणकार्य झाले असेल.इजिप्त आणि मेक्सिकोच्या स्टेप-पिरामिडप्रमाणे ही मंदिरं,जिन्यांच्या पायऱ्यांवर उठत गेली आहेत.ह्या मंदिरांवर पूर्णपणे चोल आणि गुप्तकालीन स्थापत्यशास्त्राचा प्रभाव जाणवतो.विशेषतः रामायणाचे प्रसंग ज्या नजाकतीनं दाखविले आहेत,ते बघून आपल्याला आश्चर्याचे धक्के बसत राहतात.


दुर्दैवाचा भाग इतकाच की ज्या देशाच्या राष्ट्रध्वजात जगातले सर्वांत मोठे हिंदू मंदिर आहे,त्या देशाशी भारताने आजवर कसे संबंध ठेवले ? तर अगदीच कोरडे.हे जगप्रसिद्ध मंदिर बघायला जगाच्या कानाकोपऱ्यातून पर्यटक येतात.पण त्यात भारतीय पर्यटकांची संख्या अक्षरशः नगण्य असते.पण मूळ मुद्दा तसाच राहतो,तो असा की भारतीय (किंवा त्या काळात म्हटल्या गेल्याप्रमाणे हिंदू) स्थापत्यशास्त्राची ही कमाल भारताबाहेर प्रकटली तरी तिचे मूळ किती जुने आहे...? म्हणजे स्थापत्यशास्त्रात आपण भारतीय किती काळापासून पुढारलेले आहोत ?


भारतातील अनेक देवळे विदेशी आक्रमकांनी आणि विशेषतः मुस्लीम आक्रमकांनी नष्ट केली. त्यामुळे दोन / तीन हजार वर्षांपूर्वीची स्थापत्यकला आपल्याकडे दिसणं हे तसे दुर्मीळच.मात्र त्या कलेचे अंश झिरपत आलेले आहेत.


त्यामुळे अगदी हजार / दीड हजार वर्षांपूर्वी बांधलेल्या देवळांमध्येही स्थापत्यशास्त्राचे अद्भुत चमत्कार दिसतात.विजयनगर साम्राज्याची राजधानी 'हम्पी'ला होती.या साम्राज्याला तीन मुसलमान पातशाह्यांनी मिळून पराभूत केल्यानंतर त्या सर्वांनी ह्या समृद्ध हिंदू साम्राज्याला मनसोक्त लुटले.अनेक मंदिर फोडली,नष्ट केली.मात्र जी काही उरली ती आजही स्थापत्यशास्त्राच्या अद्भुत खुणा मिरवताहेत.


हम्पीच्या एका मंदिरात प्रत्येक खांबामधून संगीताचे सा, रे, ग, म. असे वेगवेगळे सप्तसूर निघतात. 


हे त्यांनी कसं केलं असेल ? यासंबंधी काहीही लिहून ठेवलेलं नाही.असेल तरी ते आक्रमकांनी नष्ट केलंय.इंग्रजांनी ह्या स्थापत्य चमत्काराचे गूढ शोधण्यासाठी त्या संगीतमय सुरावटीतला एक खांब कापला (त्याचा क्रॉस सेक्शन घेतला). तो खांब पूर्ण भरीव निघाला..! त्याला बघून इंग्रजांचंही डोकं चालेना.अगदी एकसारख्या दिसणाऱ्या खांबांमधून संगीताचे वेगवेगळे सूर कसे उमटत असतील ? जगाच्या पाठीवर भारत सोडून इतरत्र कोठेही ही अशी खांबांमधून उमटणाऱ्या स्वरांची गंमत आढळत नाही.


फक्त इतकंच नाही,तर भारतातलं एकेक मंदिर म्हणजे स्थापत्यशास्त्राचं एक एक बुलंद उदाहरण आहे.ह्या मंदिरांचा वास्तुविशारद कोण, बांधकाम- प्रमुख कोण होता,ही मंदिरं कशी बांधली,ह्या सर्वांबद्दल काही म्हणता काहीही माहिती मिळत नाही.


मंदिरातील स्थापत्यशास्त्राविषयी आणि त्यातील विज्ञानाविषयी तसं अनेकांनी लिहिलंय.पण पुण्याच्या श्री. मोरेश्वर कुंटे आणि सौ. विजया कुंटे ह्या दम्पतीने दुचाकीवर फिरत महाराष्ट्राच्या अनेक दुर्लक्षित आणि उपेक्षित मंदिरांमधील 'स्थापत्यशास्त्राचा चमत्कार आणि विज्ञानाचे अधिष्ठान'उजेडात आणले आहे.


ग्रीनविच ही पृथ्वीची मध्य रेषा आहे असे इंग्रजांनी ठरविण्याच्या बरेच आधी भारतीयांनी पृथ्वीचे अक्षांश/ रेखांश आणि मध्यरेषा यांची व्यवस्थित कल्पना केलेली होती.ती मध्यरेषा तेव्हाच्या 'वत्सगुल्म' (म्हणजे आताच्या वाशीम) मधील मध्येश्वर मंदिरातील शंकराच्या पिंडीतून जाणारी हीच रेषा पुढे उज्जयिनीत जात होती, जिथे मोठी वेधशाळा बांधण्यात आली.आजही उज्जैन आणि वाशीम हे एका सरळ रेषेत येतात. 


कोल्हापूरच्या अंबाबाईच्या मंदिरात विशिष्ट दिवशी सूर्याच्या किरणांचा प्रकाश सरळ देवीच्या मूर्तीवर पडतो हेही ह्या स्थापत्यशास्त्राच्या परफेक्शनचं उदाहरण.


स्थापत्यशास्त्रात आपण किती पुढारलेले होतो? तर ज्या काळात कम्बोडियात अंगकोर मंदिर बांधलं जात होत,त्याच काळात चीनच्या बीजिंग ह्या राजधानीची नगररचना एक हिंदू स्थापत्यशास्त्री करत होता..! होय,बीजिंग शहराचं आर्किटेक्ट हे एका हिंदू माणसाचं आहे. त्याचं नाव बलबाहू.सध्या नेपाळमधे असणाऱ्या पाटणचा हा रहिवासी.


पाटण हे कांस्य आणि इतर धातूंच्या ओतकामाबद्दल प्रसिद्ध होतं.या शहरातील लोकांनी घडविलेल्या बुद्ध आणि हिंदू मूर्तीना तिबेट आणि चीनमधे मागणी होती.बाराव्या शतकाच्या मध्यावर चिनी राजाने केलेल्या मदतीच्या विनंतीला मान देऊन पाटणमधील ऐंशी कुशल कामगार चीनकडे निघाले.त्यांचं नेतृत्व करत होता,बलबाहू,जो तेव्हा फक्त १७ वर्षांचा होता.


पुढे चीनमधे बलबाहूचे आरेखन आणि बांधणीतले कौशल्य बघून चीनच्या राजाने त्याला बीजिंग शहराची रचना करण्याचे काम दिले. बलबाहूने ते सफलतापूर्वक करून दाखवले. 


चिनी संस्कृतीचे प्रतीक समजल्या जाणाऱ्या, उतरत्या टोकदार,डौलदार व एकाखाली एक छपरांची परंपरा बलबाहूनेच सुरू केली.

चीनमधे बलबाहू 'आर्निको' नावाने ओळखला जातो. चिनी शासनाने १ मे सन २००२ मधे बलबाहू (आर्निको) च्या नगररचनेमधील योगदानाबद्दल कृतज्ञता म्हणून बीजिंगमधे त्याचा मोठा पुतळा उभारलाय.


२६ जानेवारी २०२३ या लेखातील पुढील भाग..


२६/१/२३

धातूचा आरसा,आपला जागतिक वारसा !

चिंचोळ्या आकारात असलेल्या केरळच्या दक्षिणेला,पण आतल्या भागात,मध्यभागी,एक लहानसं सुबक गाव आहे - अरणमुला. तिरुअनंतपुरम पासून ११६ किमी.अंतरावर असलेलं हे गाव राष्ट्रीय महामार्गावर नसलं,तरी अनेक बाबतीत प्रसिद्ध आहे.पंपा नदीच्या काठावर वसलेल्या अरणमुलाला ओळखलं जातं ते नावांच्या (बोटींच्या) शर्यतीसाठी. 'स्नेक बोट रेस' नावाने प्रसिद्ध असलेल्या या शर्यती बघण्यास देश-विदेशांतून पर्यटक येतात.


याच अरणमुलामधे श्रीकृष्णाचे एक भव्य-दिव्य मंदिर आहे.'अरणमुला पार्थसारथी मंदिर'ह्या नावाने प्रसिद्ध असलेल्या मंदिरामुळे हे स्थान जागतिक वारशांच्या यादीत समाविष्ट झालेले आहे.अशी मान्यता आहे की,भगवान परशुरामाने

श्रीविष्णूंची १०८ मंदिरं बांधली,त्यांपैकीच हे एक

मंदिर आहे.केरळचें प्रसिद्ध शबरीमलाई मंदिर

येथून तसे जवळच.एकाच 'पथनामथिट्टा' ह्या

जिल्ह्यात.. भगवान अय्यप्पांची जी भव्य यात्रा

दरवर्षी शबरीमलाईहून निघते,त्या यात्रेचा एक टप्पा म्हणजे हे 'अरणमुला पार्थसारथी मंदिर'..


आणखी एका गोष्टीसाठी अरणमुला प्रसिद्ध आहे.ते म्हणजे येथील शाकाहारी थाळी.

'वाला सध्या'नावाच्या ह्या जेवण प्रकारात ४२ वेगवेगळे पदार्थ असतात.आणि हे सर्व,अत्यंत वैज्ञानिक पद्धतीने,आयुर्वेदाचा विचार करून,आहारशास्त्रानुसार वाढले जातात.


अरणमुलाच्या आजूबाजूला असलेल्या संपन्न सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वातावरणाचा परिणाम असेल कदाचित,पण त्यामुळे प्रतिक्रिया म्हणून ख्रिश्चनांनी येथे बरेच उपक्रम चालविले आहेत.येथे चर्चेसची संख्या बरीच जास्त आहे. दरवर्षी त्यांचा एक महाप्रचंड मेळावा येथे भरतो.

पण ह्या सर्व बाबींपेक्षाही एका अगदी 


आगळ्या-वेगळ्या गोष्टीसाठी अरणमुला प्रसिद्ध आहे.आणि ते म्हणजे 'अरणमुळा कन्नडी!' कन्नडीचा मल्याळममधला अर्थ आहे,आरसा ! अर्थात 'अरणमुळा आरसा.' ह्या आरशाचं वैशिष्ट्य म्हणजे हा आरसा काचेचा नसून धातूचा असतो..!


जगभरात आरसे म्हणजे काचेचेच असे समीकरण आहे.


काचेला पाऱ्याचा थर लावून आरसे तयार केले जातात.सिल्वर नाइट्रेट आणि सोडियम हायड्रोक्साईड यांच्या द्रवरूपातील मिश्रणात किंचित साखर मिसळून गरम करतात आणि अशा मिश्रणाचा थर काचेच्या मागे देऊन आरसा तयार करतात.ही झाली आरसे बनविण्याची ढोबळ पद्धत.यात विशिष्ट रसायने वापरून आणि विशिष्ट प्रकारची काच वापरून सामान्य ते अत्युत्कृष्ट दर्जाचे आरसे बनविले जातात.


अर्थात ही आरसे बनविण्याची पद्धत गेल्या दीडशे-दोनशे वर्षांतली.पाऱ्याचा थर दिलेले आरसे बनविण्याचा शोध जर्मनीत लागला.

सन १८३५च्या आसपास जर्मन रसायनशास्त्रज्ञ जुस्तुस लाईबिग याने पहिला 'पाऱ्याचा थर दिलेला आरसा'तयार केला.


मात्र जगाच्या पाठीवर आरसे बनविण्याची कला फार जुनी आहे.


सर्वांत जुना म्हणजे सुमारे ८००० वर्षांपूर्वी आरशांचा उल्लेख आस्तोनिया म्हणजे आजच्या तुर्कस्थानात आढळतो.त्याच्यानंतर इजिप्तमधे आरसे मिळाल्याची नोंद आहे.दक्षिण अमेरिका, चीनमधेही काही हजार वर्षांपूर्वी आरसे वापरात होते असे उल्लेख आढळतात.


या आरशांचे प्रकार वेगवेगळे होते.दगडाचे, धातूचे,काचेचे आरसे वापरण्याच्या नोंदी आहेत. मात्र काचेशिवाय इतर धातू / दगडांपासून बनविलेले आरसे उच्च प्रतीचे नसायचे. 


तुर्कस्थानात सापडलेले आरसे हे ओब्सिडियन (म्हणजे लाव्हा रसापासून बनविलेली काच) चे होते.


आरशासंबंधी लिहिलेल्या वेगवेगळ्या प्रबंधांत किंवा विकिपीडियासारख्या ठिकाणी भारताचा उल्लेख फारसा आढळत नाही.याचे कारण म्हणजे भारतातले लिखित साहित्य बऱ्याच मोठ्या प्रमाणात आक्रमकांनी नष्ट केले.श्रुती, स्मृती,वेद,पुराण,उपनिषदे वगैरे ग्रंथ वाचिक परंपरेच्या माध्यमातून टिकले..पण आपली प्राग-ऐतिहासिक किंवा ऐतिहासिक माहिती काळाच्या ओघात बरीचशी नष्ट झाली.असे असले तरीही अजिंठ्याच्या चित्रात किंवा खजुराहोच्या शिल्पात,हातात आरसा घेतलेली, शृंगार करत असलेली रमणी आपल्याला दिसते. म्हणजे आरशाचा उपयोग हजारो वर्षांपासून भारतात सर्वमान्य होता हे निश्चित.


सध्या बेल्जियमची काच आणि बेल्जियमचे आरसे जगभरात प्रसिद्ध आहेत.मात्र त्या बेल्जियमच्या आरशांना टक्कर देतील असे धातूचे आरसे अरणमुलाला बनवले जातात. अगदी नितळ आणि आरस्पानी प्रतिमा दाखविणारे आरसे..!


हे आरसे एका विशिष्ट मिश्र धातूचे बनलेले असतात.मात्र यात नेमके कोणते धातू वापरले जातात हे अजूनही गुलदस्त्यात आहे. धातुशास्त्रज्ञांनी ह्या आरशांचं विश्लेषण करून सांगितलं की,तांबे आणि टीनच्या विशिष्ट मिश्रणाने बनविलेल्या धातूला अनेक दिवस पॉलिश केले की बेल्जियमच्या काचेच्या आरशांशी स्पर्धा करणारे आरसे तयार होतात. आणि हे ओळखले जातात,'अरणमुळा कन्नडी' ह्या नावाने.


केरळच्या अरणमुलामधे तयार होणारे हे आरसे वैशिष्ट्यपूर्ण आहेत,कारण जगाच्या पाठीवर, इतरत्र कोठेही असे आरसे तयार होत नाहीत. किंबहुना धातूपासून इतके नितळ आणि सुस्पष्ट प्रतिमा दाखविणारे आरसे तयार करण्याचं तंत्र, ह्या एकविसाव्या शतकातही कोणत्याही शास्त्रज्ञाला शक्य झालेलं नाही.जगात प्रचलित आरशांमध्ये प्रकाशाचे परावर्तन मागून होते.मात्र अरणमुला कन्नडीमधे ते समोरच्या पृष्ठभागातून होते,आणि त्यामुळे उमटलेली प्रतिमा ही स्वच्छ आणि सुस्पष्ट असते.लंडनच्या 'ब्रिटिश म्युझियम' मध्ये एक ४५ इंचांचा भला मोठा अरणमुला कन्नडी ठेवलेला आहे,जो पर्यटकांचे आकर्षण आहे.


ह्या आरशांच्या उत्पादनाची प्रक्रिया म्हणजे काही कुटुंबाच्या समूहाने जपलेले एक रहस्य आहे. त्यामुळे ह्या लोकांशिवाय हे आरसे इतर कुणालाही तयार करता येत नाहीत.असं म्हणतात,अरणमुलाच्या पार्थसारथी (श्रीकृष्ण) मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी,काही शतकांपूर्वी तेथील राजाने,शिल्पशास्त्रात प्रवीण असलेल्या आठ कुटुंबांना पाचारण केलं होतं. या कुटुंबांजवळ हे धातूचे आरसे तयार करण्याचं तंत्रज्ञान होतं.मुळात बांधकामात तज्ज्ञ असलेल्या या कुटुंबांजवळ हे तंत्रज्ञान कुठून आलं,याबद्दल काहीही भक्कम माहिती मिळत नाही.ही आठ कुटुंबं तामिळनाडूमधून अरणमुलाला आली हे निश्चित.यांच्याजवळ धातूंना आरशाप्रमाणे चकचकीत करण्याचं तंत्रज्ञान फार आधीपासून होतं.मात्र त्याचा व्यापारिक उपयोग करायचं काही ह्या कुटुंबांच्या लक्षात आलं नसावं.


अरणमुला पार्थसारथी मंदिराचा जीर्णोद्धार करून झाल्यावर पुढे काय ? असा विचार करत असताना या कुटुंबांनी तिथल्या राजाला चमकत्या धातूचा राजमुकुट करून दिला. राजाला तो इतका आवडला की,त्याने ह्या कुटुंबांना जागा दिली,भांडवल दिलं आणि त्यांना धातूचे आरसे तयार करायला सांगितलं.ह्या आरशांना बायकांच्या आठ सौभाग्य लेण्यांमध्ये समाविष्ट केलं.आणि तेव्हापासून ह्या कुटुंबांनी धातूंचे आरसे तयार करण्याचा पेशा पत्करला.


ह्या आरशांमागे अनेक पौराणिक कथा / दंतकथा आहेत.हा आरसा सर्वप्रथम पार्वतीने शृंगार करताना वापरला असंही मानलं जातं.विशेषतः वैष्णवांच्या पार्थसारथी मंदिराच्या परिसरात ही पौराणिक कथा शेकडो वर्षांपासून श्रद्धेने ऐकली जाते.आज हे आरसे म्हणजे जागतिक ठेवा आहे.हे सर्व आरसे हातानेच तयार केले जातात. सुमारे डझनभर आरसे तयार करायला दोन आठवडे लागतात.कोणतेही दोन आरसे सहसा एकसारखे नसतात.परदेशी पर्यटकांमध्ये ह्या आरशांबद्दल प्रचंड आकर्षण आहे.अगदी लहानात लहान,म्हणजे एक-दीड इंचाच्या आरशाची किंमत १,२०० रुपयांच्या पुढे असते.दहा- बारा इंची आरसे तर अनेकदा वीस-पंचवीस हजारांपर्यंत विकले जातात. अनेक कॉर्पोरेट कंपन्या हे आरसे भेटवस्तू म्हणून देण्यासाठी वापरतात.


जगाच्या पाठीवर एकमेव असलेली आणि वैज्ञानिकांना कोड्यात पाडणारी,ही धातूचे आरसे तयार करण्याची कला काही शतकांपूर्वी उजेडात आली.मात्र ती काही हजार वर्षं जुनी असावी हे निश्चित,पण मूळ मुद्दा तसाच राहतो- हजारो वर्षांपूर्वी धातुशास्त्रातली ही नजाकत,हे ज्ञान आपल्याजवळ आले कोठून.. ?


२२ जानेवारी २०२३ लेखामधील पुढील भाग..

२४/१/२३

कारण ..हे आयुष्य पुन्हा नाही..

आपल्या आयुष्यातील सर्व उंट एकाचवेळी झोपनार नाहीत.'


एक गोष्ट शिकण्यासारखी :

आपण सर्व ५ मिनिटांसाठी आप आपल्या आयुष्यातील आप आपले उंट सांभाळणाऱ्या एका राखवालदारा प्रमाणेच आहोत असे समजूया.. एका माणसाकडे १०० उंट होते आणि त्यांना सांभाळण्यासाठी एक रखवालदार होता. काही कारणामुळे त्याचा हा रखवालदार नोकरी सोडून गेला. त्याच्या जागी त्याने एका दुसर्‍या माणसाची नेमणुक केली.दुसर्‍या माणसाला त्याने एक अट घातली, की रात्री त्याने पहार्‍यावर असताना सगळे उंट झोपल्याशिवाय झोपायचं नाही.एक जरी उंट जागा असेल तरी झोपायचं नाही. 


नोकरीची गरज असल्याने त्याने ही अट मान्य केली.दोन दिवस, तीन दिवस त्याला झोप मिळाली नाही.तो प्रामाणिकपणे आपले काम करत राहिला. मात्र १५/२० दिवस तो झोपू शकला नाही,कारण सर्व उंट एकदम कधीच झोपत नसत.एके दिवशी मात्र त्याचे नशीब फळफळले. १०० पैकी ९९ उंट झोपले. हा शेवटचा उंट झोपण्याची वाट पाहू लागला. मात्र तो काही झोपेना.म्हणून बर्‍याच वेळाने त्याने त्या उंटाला झोपवण्याचा प्रयत्न केला. त्याने त्याच्या गळ्याला मिठी मारुन त्याला झोपवायचा प्रयत्न केला. मात्र झालं भलतंच.. त्याच्या या प्रयत्नात त्याच्या गळ्यातली घंटी वाजून बाकीचे उंट जागे झाले आणि याला जागावे लागले.


वैतागून तो पहिल्या रखवालदाराचा सल्ला घ्यायला गेला आणि विचारले, "एवढी वर्षं तू कसा काय न झोपता राहिलास? कारण सगळे उंट काही एकदम झोपत नाहीत."

त्यावर तो म्हणाला "मी कधीच सगळे उंट झोपायची वाट पाहिली नाही.माझ्या वेळेत मी झोपत होतो.कारण सर्व उंट एकावेळी झोपणे हे अशक्य आहे.आपण त्याकडे दुर्लक्ष करायचे…"

Moral of the story…

मित्रांनो,आपण आपल्या आयुष्यात बर्‍याचदा असे ठरवतो,कि आता हा एक टप्पा पूर्ण केला कि मग संपलं सगळं,मग मला काही करायची गरज नाही किंवा हे काम पूर्ण झाले,की मी निवांत;मला कुठलीही काळजी नाही;मग मी आनंदात जगेन.हा प्रोजेक्ट किंवा हे उरकलं,कि मी जीवनाचा आनंद घ्यायला मोकळा..

त्यासाठी आपण आपले आत्ताचे सुख सोडून देतो,एखादी सुखावणारी गोष्ट करणे लांबणीवर टाकतो.पुन्हा काही काळजी नाही आता निवांत झालो,असं म्हणून श्वास सोडतो;पण त्याचवेळी दुसरे काहीतरी समोर उभे राहते अन् पुन्हा आपले रहाटगाडगे सुरु राहते पुढच्या आशेवर. पण हे संपत नाही आणि मनासारखे जगणे होत नाही.आपल्या कामांच्या आणि अपेक्षांचे,चिंतांचे उंट कधीही एकावेळी झोपणार नाहीत,एखादा जागा राहणार आहेच,त्याला झोपवायच्या नादात बाकीचे जागे करु नका,त्याकडे "थोडसं" दुर्लक्ष करा,आणि आयुष्य उपभोगा!!! आपल्या चिंता आणि आपली कामे सर्व कधीच न संपणारी आहेत तेंव्हा चिंतामुक्त व्हा आणि मोकळेपणे जगा. मन मारुन जगने थांबाले पाहिजे...जीवनाचा आनंद घेऊया.


नंतर करु असं म्हणत टाळत असलेल्या गोष्टी करायला पुढे पुरेसा वेळ आणि तो उत्साह शिल्लक राहील का,हे तरी आपल्याला माहीत आहे का? याचाही विचार होणं गरजेचं आहे.

बघा विचार करा..


एका सेमिनारमधील गोष्ट..


२२/१/२३

भारतच प्लॅस्टिक सर्जरीचा जनक !

भारतात हैदर-टिपू सुलतानाबरोबर झालेल्या युद्धात इंग्रजांना दोन नवीन गोष्टींचा शोध लागला होता.(अर्थात हे इंग्रजांनीच नमूद करून ठेवलंय) एक म्हणजे युद्धात वापरले जाणारे रॉकेट आणि दुसरं म्हणजे प्लॅस्टिक सर्जरी.


इंग्रजांना सापडलेल्या ह्या प्लॅस्टिक सर्जरीचा इतिहास मोठा गंमतीशीर आहे.सन १७६९ ते १७९९ ह्या तीस वर्षांत हैदर अली-टिपू सुल्तान आणि इंग्रजांमध्ये ४ मोठ्या लढाया झाल्या.यांतील एका लढाईत इंग्रजांकडून लढणारा 'कावसजी' हा मराठा सैनिक आणि ४ तेलंगी बाजार बुणगे टिपूच्या फौजेच्या हातात सापडले. टिपू सुल्तानच्या फौजेने ह्या पाची जणांची नाकं कापून त्यांना इंग्रजांकडे परत पाठवले.


काही दिवसांनी एका इंग्रज कमांडरला,एका भारतीय व्यापाऱ्याच्या नाकावर काही खुणा दिसल्या.चौकशी केल्यावर कमांडरला समजले की,त्या व्यापाऱ्याने काही 'भानगड' केली होती म्हणून त्याचे नाक कापण्यात आले होते.परंतु त्या व्यापाऱ्याने एक वैद्याकडून आपले नाक पूर्वीसारखे करून घेतले.आश्चर्यचकित झालेल्या इंग्रजी कमांडरने त्या कुंभार जातीच्या मराठी वैद्याला बोलाविले आणि कावसजी व इतर चौघांची नाक पहिल्यासारखी करायला सांगितलं.


कमांडरच्या आज्ञेवरून पुण्याजवळ हे ऑपरेशन झाले.हे ऑपरेशन होताना दोन इंग्रजी डॉक्टर्स उपस्थित होते.त्यांची नावं- थॉमस क्रूसो आणि जेम्स फिंडले.या दोघांनी 'अज्ञात मराठी वैद्याने' केलेल्या ह्या ऑपरेशनचं सविस्तर वर्णन मद्रास गॅझेटमध्ये पाठवलं,जे छापून आलं. ह्या मद्रास गॅझेटमध्ये छापून आलेल्या लेखाचं पुनर्मुद्रण, लंडनहून प्रकाशित होणाऱ्या 'जंटलमन' ह्या मासिकाने ऑक्टोबर १७९४ च्या अंकात केलं. या अंकात 'बी. एल.' ह्या नावाने एका गृहस्थाने ही बातमी दिलेली आहे.लेखासोबत शस्त्रक्रियेसंबंधी काही चित्रेही दिली आहेत. या लेखापासून प्रेरणा घेऊन इंग्लंडच्या जे.सी.कॉर्प ह्या तरुण सर्जनने याच पद्धतीने दोन शस्त्रक्रिया केल्या,ज्या यशस्वी झाल्या.हे ऐकून ग्रेफे ह्या जर्मन सर्जननेही याच धरतीवर प्लॅस्टिक सर्जरीच्या यशस्वी शस्त्रक्रिया केल्या.आणि मग पाश्चात्त्य जगाला आणि विशेषतः इंग्रजांना 'प्लॅस्टिक सर्जरी'ची ओळख झाली.पहिल्या विश्वयुद्धात तर अशा शस्त्रक्रियांचा फारच उपयोग झाला.पाश्चात्त्य जगात 'एडविन स्मिथ पापिरस' ने सर्वप्रथम प्लॅस्टिक सर्जरीचा उल्लेख आढळतो.मात्र रोमन ग्रंथांमध्ये या शस्त्रक्रियेचा उल्लेख हजार वर्षांपूर्वीपासून मिळतो.


अर्थात भारतासाठी या शस्त्रक्रिया फार जुन्या आहेत.सुमारे पावणेतीन हजार वर्षांपूर्वी सुश्रुत या शस्त्रवैद्यकाने या शस्त्रक्रियेची संपूर्ण माहिती देऊन ठेवली आहे.झाडाचे एक पान घेऊन ते नाकावर ठेवले जाते.नाकासारखा आकार त्याला दिला जातो.आणि नंतर त्या पानाला आवश्यक तिथे कापून,त्याच आकाराची कातडी गाल, कपाळ किंवा हात,पाय यातून काढली जाते. विशिष्ट औषधांचा लेप लावून ती कातडी आवश्यक तिथे बसवून तिला बांधले जाते. बसवलेली कातडी आणि काढलेली कातडी.या दोन्ही जागांवर ठराविक औषधांचा लेप लावला जातो.साधारण तीन आठवड्यांनी दोन्ही ठिकाणी नवीन कातडी येते आणि हे कातडीचे प्रत्यारोपण पूर्ण होते.याच माहितीच्या अनुसार त्या 'अज्ञात मराठी वैद्याने' कावसजीवर नाकाची यशस्वी शस्त्रक्रिया केली.


नाक,कान आणि ओठांना व्यवस्थित करण्याचे तंत्र भारताला फार पूर्वीपासून अवगत होते.पूर्वी, टोचलेल्या कानात जड दागिना घातला की कानाची पाळी फाटायची.अशा कानाला ठीक करण्यासाठी तेथे गालाची कातडी बसवण्याची पद्धत रूढ होती.अगदी एकोणिसाव्या शतकापर्यंत भारतात ह्या शस्त्रक्रिया वैद्यांद्वारे केल्या जायच्या.हिमाचल प्रदेशातील कांगडा जिल्हा तर अशा शस्त्र- वैद्यकांसाठी प्रसिद्ध होता. सं म्हटलं जातं की,कांगडा हा शब्दच मुळी कान+गढा (हिंदीत 'गढा' म्हणजे तयार करणे) यातून निर्माण झाला आहे.डॉ.एस.सी.अलमस्त यांनी या 'कांगडा मॉडेल' वर बरेच लिहून ठेवले आहे.ते कांगडा च्या 'दिनानाथ कानगढीया' ह्या नाक,कानाची शस्त्रक्रिया करणाऱ्या वैद्याला स्वतः भेटले. त्याचे अनुभव त्यांनी शब्दबद्ध केले आहेत.सन १४०४ पर्यंतच्या पिढीची माहिती असणारे हे 'कानगढीया',नाक आणि कानाची 'प्लॅस्टिक सर्जरी' करणारे कुशल वैद्य समजले जात. ब्रिटिश संशोधक सर अलेक्झांडर कनिंघम (१८१४ - १८९३) याने कांगडाच्या प्लॅस्टिक सर्जरीच्या प्रक्रियेबद्दल विस्ताराने लिहून ठेवले आहे.


अकबराच्या काळात 'बिधा' नावाचा वैद्य कांगडामधे शस्त्रक्रिया करायचा हेही लिहून ठेवलेले आढळते.


सुश्रुतच्या सुमारे अकराशे वर्षांनंतर सुश्रुत संहिता आणि चरक संहितांचा अरबी भाषेत अनुवाद झाला.हा आठव्या शतकातच झाला.'किताब-ई- 'सुसरुद' ह्या नावाने सुश्रुत संहिता मध्यपूर्वेत पोहोचली.


पुढे ज्याप्रमाणे भारतातील गणित आणि खगोल शास्त्रासारख्या विज्ञानाच्या इतर शाखा अरबी लोकांच्या माध्यमातून युरोपात पोहोचल्या, तशीच ही माहितीही युरोपात पोहोचली.


चौदाव्या पंधराव्या शतकांत,ह्या शस्त्रक्रियेची माहिती अरब - पर्शिया (इराण) - इजिप्त ह्या मार्गाने इटलीला पोहोचली.या माहितीच्याच आधारे इटलीमधल्या सिसिली बेटावरचा ब्रान्का परिवार आणि गास्परे टाग्लीयाकोसी यांनी कर्णबंध आणि नाकाच्या शस्त्रक्रिया सुरू केल्या.मात्र चर्चच्या प्रचंड विरोधामुळे त्यांना त्या थांबवाव्या लागल्या.आणि म्हणूनच एकोणिसाव्या शतकापर्यंत युरोपियनांना प्लॅस्टिक सर्जरी अज्ञातच राहिली.


ऋग्वेदातील आत्रेय उपनिषद हे अति-प्राचीन उपनिषदांपैकी एक समजले जाते.ह्या उपनिषदात गर्भातील मूल कसे तयार होते,याचे वर्णन आहे.त्यात असे म्हटले आहे की,गर्भाच्या अवस्थेत प्रथम तोंडाचा काही भाग तयार होतो. नंतर नाकाचा,मग डोळे,कान,हृदय इत्यादी अवयव तयार होत जातात.आजच्या आधुनिक शास्त्राचा आधार घेऊन,सोनोग्राफी वगैरे करून बघितलं तर ह्याच अवस्थांमधून मूल तयार होत जाते.आता हे ज्ञान हजारो वर्षांपूर्वी आपल्या पूर्वजांना कुठून मिळाले..?


त्यामुळे प्लॅस्टिक सर्जरी भारतात किमान अडीच ते तीन हजार वर्षांपासून अस्तित्वात होती याचे खणखणीत पुरावे मिळाले आहेत.शरीरशास्त्राचे ज्ञान,त्यावरील उपचार हे भारताचे वैशिष्ट्य होते. आपण आपल्या जुन्या ज्ञानातून तयार केलेल्या गोष्टी म्हणजे जुनाट कल्पनांना कवटाळणे.. अशा चुकीच्या समजुतीपायी आपण आपल्याच समृद्ध वारशाला नाकारत आलो आहोत..


१८ जानेवारी २०२३ या लेखातील पुढील भाग..


२०/१/२३

मानवी शरीर किती गुंतागुंतीचे आहे ही सांगणारी सत्य घटना…!

केईएममध्ये घडलेली घटना पंचवीशीचा एक तरुण रुग्ण होता.त्याला हर्निया होता.शस्त्रक्रियेसाठी घेतलं,

तर त्याच्या पोटात गर्भाशय सापडलं.शस्त्रक्रियेनं ते काढल.तो 


'युटराइन हार्निया सिंड्रोम' होता... जन्मतःच बाळाच्या वाढीत काही हार्मोनल गुंतागुंत झालेली असते.पुरुष बाळात स्त्री हार्मोन्स थोडी जास्त असतात.आणि त्यामुळे त्याचं गर्भाशय आणि त्याआसपासचे काही अवयव तयार झालेले असतात.अर्थात,पुरुष हार्मोन्स अधिक असल्यामुळे त्यांची पूर्ण वाढ होत नाही,पण मुलगा मोठा झाला की त्याला हार्नियाचा त्रास सुरू होतो आणि मग हे लक्षात येतं.क्वचित घडणारी गोष्ट आहे.


ही,पण पुरुषाच्या पोटात गर्भाशय आहे हे 

कुटुंबाला समजून घ्यायला फार कठीण जातं.सुदैवाने आम्ही ज्याची शस्त्रक्रिया केली होती,त्या तरुणाची पुरुषाची इंद्रियं नॉर्मल होती आणि त्यामुळे तो पुढचं आयुष्य नीट जगू शकला.आमच्यासाठी ही एक सायंटिफिक केस होती नि ती आम्ही पुढे प्रसिद्ध केली.त्यावर एक पेपरही लिहिला.


अठरा वर्षांचा एक मुलगा १९९५-९६ मध्ये आला होता.त्याच्या पोटात मोठा गोळा होता, उपचारासाठी तो आला होता.त्याचं सीटी स्कॅन केलं तर ते मृत अर्भक होतं!


 याला 'फीटस इन फिटू' म्हणतात.जन्मतः तो जुळा असेल,पण दोन स्वतंत्र,सुटे गर्भ तयार होण्याऐवजी एकात एक दोन बाळं तयार झाली.हे इतकी वर्षं कळलंच नाही.त्याची शस्त्रक्रिया करणं तसं जिकिरीचं होतं.तरी आम्ही ते यशस्वीरित्या केलं.तो रिपोर्ट आम्ही पब्लिशही केला.त्याच्या आजाराचं 'निदान' ऐकून त्याचे नातलग आठवडाभर फिरकलेच नाहीत.ते आल्यावर त्यांना समजावलं.खूप प्रयत्नांनंतर त्यांनी ते स्वीकारलं.


अशा अनेक केसेस केईएममध्ये पाहिल्या. अनेकांवरच्या शस्त्रक्रियांमध्ये सहभागी झालो, अनेक शस्त्रक्रिया स्वतः केल्या.अनेक रुग्ण माझ्या लक्षात राहिले,त्यांच्या मी लक्षात राहिलो. आमच्यात एक छान नातं निर्माण झालं... ते अजूनही आहे.


'सर्जनशील' या पुस्तकातील हा अभ्यासपूर्ण उतारा…


लेखक -डॉ.अविनाश सुपे

ग्रंथाली प्रकाशन 

१८/१/२३

आणि तीही काळ्या रंगातली अक्षरं नाहीत,तर केशरी रंगातली,अष्टगंधाने काढलेली आहेत,असं वाटणारी अक्षरं !

अदृश्य शाईचे रहस्य….


आमगाव हा आपल्या महाराष्ट्रातल्या गोंदिया जिल्ह्याचा लहानसा तालुका.छत्तिसगढ आणि मध्यप्रदेशाला लागून असलेला.गाव तसं लहानसंच.ह्या गावातले रामगोपाल अग्रवाल हे व्यवसायाने सराफ.घरचा चांदी-सोन्याचा व्यापार.'बेदिल' ह्या टोपणनावाने प्रसिद्ध असलेल्या ह्या रामगोपालजींना एक दिवस काय उपरती झाली,कोणास ठाऊक.पण त्यांच्या मनाने घेतलं की,आसामच्या दक्षिणेला असलेल्या ब्रम्हकुंडात स्नान करण्यासाठी आपण जायचं.आता ब्रम्हकुंडच का..? तर त्याला काही विशेष कारण नाही.हे ब्रम्हकुंड (ब्रम्हसरोवर), परशुराम कुंड म्हणूनही ओळखलं जातं. आसामच्या सीमेवर असलं तरी हे कुंड येतं अरुणाचल प्रदेशाच्या लोहित जिल्ह्यात.मकर संक्रांतीला येथे मोठी यात्रा भरते.


हे स्थान म्हणजे अग्रवाल समाजाचे मूळ पुरुष भगवान अग्रसेन महाराजांचं सासर.त्यांच्या पत्नी माधवीदेवी ह्या नाग लोकांच्या राजकन्या.ह्या ब्रम्हकुंडा- शेजारीच अग्रसेन महाराजांचा विवाह झाला असं सांगितलं जातं.


कदाचित हेच कारण असेल,रामगोपाल अग्रवाल 'बेदिल' ह्यांच्या ब्रम्हकुंडाला भेट देण्याच्या निश्चयात.मग ठरल्याप्रमाणे रामगोपालजी, आपले ४-५ मित्र घेऊन ब्रम्हकुंडावर पोहोचले. भेट देण्याच्या आधल्या रात्री त्यांच्या स्वप्नात आलं की 'उद्या त्या ब्रम्हसरोवराच्या तीरावर असलेल्या वटवृक्षाच्या खाली एक साधू बसलेला असेल.तेथेच तुला हवं ते मिळेल.'


दुसऱ्या दिवशी सकाळी रामगोपालजी त्या ब्रम्हकुंडाच्या (ब्रम्हसरोवराच्या) काठाशी गेले तर त्यांना तिथे भला मोठा वृक्षही दिसला आणि दाढी वाढवलेला एक साधूही दिसला. रामगोपालजींनी त्याला नमस्कार करताच त्याने आपल्याजवळची,एक चांगल्या कापडात बांधलेली वस्तू त्यांना दिली अन् म्हटले, "जाव.. इसे ले जाओ.." हा दिवस होता,९ ऑगस्ट १९९१.


भलंमोठं दिसणारं,पण हलकं वाटणारं ते गाठोडं घेऊन रामगोपालजी आपल्या मुक्कामाच्या ठिकाणी आले,आणि त्यांनी ते गाठोडं उघडून बघितलं.तर आत कोरी भूर्जपत्रं व्यवस्थित बांधून ठेवलेली.आता कोरी भूर्जपत्रं (म्हणजे त्यांना भूर्जपत्र म्हणायचं असं रामगोपालजींना फार उशिरा समजलं) काय करायची असा विचार त्यांच्या मनात आला.पण प्रसाद समजून त्यांनी ते गाठोडं आमगावला आणलं.फक्त ३० ग्रॅम वजनाच्या या गाठोड्यात ४३१ कोरी (रिकामी) भूर्जपत्रं होती..


बालाघाट जवळच्या 'गुलालपुरा' गावात ह्या रामगोपालजींचे गुरू होते.त्या गुरूंना बोलावण्यात आलं आणि ते गाठोडं दाखवलं. रामगोपालजींनी गुरूंना विचारलं,'काय करू ह्या कोऱ्या भूर्जपत्रांचं ?'गुरुजींनी उत्तर दिलं, 'कामाचे वाटत नाहीत नं तुला,मग पाण्यात टाकून दे.' आता रामगोपालजी दोलायमान.ते गाठोडं ठेववतही नाही आणि टाकवतही नाही..


तशातच एक दिवस पूजा करत असताना देवघरात ठेवलेल्या ह्या कोऱ्या भूर्जपत्रावर पाण्याचे काही थेंब पडले आणि अहो आश्चर्यम..! त्या तितक्या भागात अक्षरं उमटून आली.रामगोपालजींनी मग एक भूर्जपत्र पाण्यात बुडवलं.अन् चमत्कार झाल्यासारखा त्या पानावरचा संपूर्ण मजकूर अगदी स्वच्छ दिसू लागला.आणि तीही काळ्या रंगातली अक्षरं नाहीत,तर केशरी रंगातली,अष्टगंधाने काढलेली आहेत,असं वाटणारी अक्षरं !


थोड्या वेळानंतर,त्या भूर्जपत्रातलं पाणी वाळल्याबरोबर ती अक्षरंही दिसेनाशी झाली. मग रामगोपालजींनी पूर्ण ४३१ पानं पाण्यात टाकून,ती वाळण्यापूर्वी त्यातील मजकूर उतरवून घेण्याचा प्रयत्न केला.मजकूर देवनागरी लिपीत, संस्कृतमधे लिहिला होता.हे काम काही वर्षं चाललं.काही संस्कृत जाणकारांकडून या मजकुराचा अर्थ समजावून घेतला तर लक्षात आलं,भूर्जपत्रावर अदृश्य शाईने लिहिलेली ती पोथी म्हणजे अग्रसेन महाराजांचं चरित्र आहे - 'अग्र भागवत' या नावाचं.


हजारो वर्षांपूर्वी जैमिनी ऋषींनी लिहिलेल्या 'जयभारत' नावाच्या एका मोठ्या ग्रंथाचा,'अग्र भागवत' एक भाग आहे.पांडव वंशातील परीक्षिताचा मुलगा जनमेजय.त्याला लोकधर्माच्या साधनेचा विस्तार करण्यासाठी जैमिनी ऋषींनी हा ग्रंथ सांगितला.


या अग्र भागवत ग्रंथाची लोकांमध्ये बरीच चर्चा झाली.अग्रवाल समाजात ह्या ग्रंथाचं प्रचंड स्वागत झालं.ग्रंथाची पानं अनेकदा पाण्यात बुडवून,लोकांना दाखवून झाली.या ग्रंथाची कीर्ती इतकी पसरली की,अग्रवाल समुदायापैकी एक, इंग्लंडमधील प्रख्यात उद्योगपती,लक्ष्मी मित्तल यांनी काही कोटी रुपयांमध्ये तो ग्रंथ विकत घेण्याची तयारी दाखविली.


हे सर्व बघून अग्रवाल समाजातली काही मंडळी पुढे आली आणि त्यांनी संस्कृतचे विद्वान, नागपूरचे श्री.रामभाऊ पुजारी यांच्या मदतीनं एक ट्रस्ट स्थापन ॥ श्रीमद् अग्रभागवतम् ॥ केला आणि त्या ग्रंथाला सुरक्षित ठेवण्याची व्यवस्था केली.


आज तो ग्रंथ 'अग्रविश्व ट्रस्ट' मधे सुरक्षित आहे. सुमारे १८ भारतीय भाषांमध्ये हा ग्रंथ अनुवादित होऊन प्रकाशित झालेला आहे आणि रामभाऊ पुजारी यांच्या सल्ल्यानुसार मूळ भूर्जपत्रावरील ग्रंथ सांभाळून ठेवला आहे.


ह्या सर्व प्रकरणातला श्रद्धेचा भाग सोडूनही देऊ, तरी मुद्दा शिल्लक उरतो की हजारों वर्षांपूर्वी भूर्जपत्रांवर अदृश्य शाईने लिहिण्याचे तंत्रज्ञान कोणते ? ते कसे वापरले जायचे,अन् कुठे वापरले जायचे?


भारतामध्ये लिहून ठेवण्याची पद्धत खूप खूप प्राचीन आहे.ताम्रपत्र, - चर्मपत्र,ताडपत्र,भूर्जपत्र ही सारी लिखाणाची माध्यमं.


मराठी विश्वकोशात भूर्ज-पत्रांबद्दल माहिती दिलेली आहे ती अशी - 


'भूर्जपत्रे ही भूर्ज नावाच्या वृक्षाच्या सालीपासून बनवीत.हे वृक्ष बेट्यूला वंशातील असून हिमालयात,विशेषतः काश्मीरातील हिमालयात वाढतात.यांच्या साली सोलून व वाळवून त्यांना तेल लावून त्यांची पृष्ठे गुळगुळीत करीत व त्यांचे मोठ्या लांबी-रुंदीचे पत्रे तयार करून त्यांच्यावर शाईने लिहीत.पत्रांना भोके पाडून व त्या भोकांत दोरी ओवून पुस्तके बांधली जात.


ही भूर्जपत्रे,त्यांच्या दर्जानुसार ३ महिने ते २,००० वर्षे टिकत.भूर्जपत्रावर किंवा ताडपत्रांवर लिहिण्यासाठी फार पूर्वीपासून शाईचा वापर

केला जात होता. इसवी सनापूर्वी अडीच हजार वर्षेपर्यंत शाई वापरली जाण्याचे पुरावे मिळाले आहेत.भारतात शाई केव्हापासून वापरली जातेय,नक्की सांगणं कठीण आहे.भारतावर चाल करून आलेल्या आक्रमकांनी येथील ज्ञान मोठ्या प्रमाणावर नष्ट करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे हे असे जुने दुवे मिळत नाहीत.


पण शाई तयार करण्याच्या काही प्राचीन पद्धती माहीत आहेत.त्या अधिकांश पद्धतीत काळ्या शाईचाच उल्लेख आहे.फक्त काही ठिकाणी गेरू वगैरेंच्या मदतीने तयार केलेल्या केशरी शाईचा उल्लेख येतो. मराठी विश्वकोशात शाईची दिलेली माहिती अशी -


'भारतात दोन प्रकारची शाई वापरीत असत. कच्च्या शाईने व्यापारी जमाखर्च, तर पक्क्या शाईने ग्रंथ लिहीत असत. पिंपळाचा गोंद दळून, उकळून, तिळाच्या तेलावरील काजळी पातळ कापडात घालून गोंदाच्या पाण्यात ती पुरचुंडी फिरवीत. भूर्जपत्रावर लिहिण्याची शाई वेगळी असे. बदामाच्या साली व कोळसे यांपासून किंवा जाळलेले भात गोमूत्रात उकळून ती तयार करीत.काळ्या शाईने लिहिलेला सर्वांत जुना मजकूर इ.स. तिसऱ्या शतकातील सापडतो.


पण यात एक गंमत आहे.ज्या पदार्थांचा शाई तयार करण्यासाठी उपयोग होतो,ते सर्व पदार्थ पाण्यात विरघळणारे आहेत.मात्र आपल्या 'अग्रभागवत' या ग्रंथातील भूर्जपत्राचे पान पाण्यात टाकल्यावर शाई दिसू लागते.


अर्थात किमान दोन-अडीच हजार वर्षांपूर्वी आपल्या देशाला अदृश्य शाईने लिहिण्याचं तंत्र अवगत होतं.हे तंत्र तेव्हा अनेक संशोधनांनंतर सिद्ध झालं असेल.अनेक प्रकारची रसायनं यात वापरली गेली असतील.त्यांचे वेगवेगळे प्रयोग या देशात झाले असतील.दुर्दैवानं आज मात्र यातील काहीही शिल्लक नाही.उपलब्ध आहे तो अदृश्य शाईच्या अस्तित्वाचा खणखणीत पुरावा - 'अग्रभागवत'च्या रूपात..!


थोडक्यात काय तर विज्ञान,आणि तेही 'शास्त्रशुद्ध विज्ञान',हा प्रकार पाश्चिमात्यांनी आणला या घट्ट झालेल्या मनोभूमिकेला हे 'अग्रभागवत' म्हणजे एक मोठाच हादरा आहे.


एकेकाळी अत्यंत प्रगत असं लेखनशास्त्र या देशात नांदत होतं आणि ज्ञानाच्या प्रचंड भांडाराचं पिढी - दरपिढी हस्तांतरण करण्याची क्षमता या शास्त्रात होती,हे आता सिद्ध झालंय.


१६ जानेवारी २०२३ या लेखातील पुढील भाग..