* विजय गायकवाड | Vijay Gaikawad

live

नमस्कार आपले स्वागत आहे. मी पुस्तके आणि मित्रांवर पैसे खर्च करतो,माझ्याकडे दगड आणि विटांवर खर्च करण्यासाठी पैसे नाहीत.- रस्किन बाँड.ही थोर माणसं व त्यांचे विचार मला पुस्तकात भेटलीत.ती भेटली आणि त्यांनी सांगितले कि, प्रत्येक दिवशी असं काही तरी करा की,ते तुम्हाला अधिक सुंदर उद्याच्या दिशेने खूप लांबवर घेऊन जाईल."- डोग फायरबाऊ.' सर्वियन कादंबरीकार मिलोराद पावीच यांचे एक वाक्य आहे ते म्हणतात - जोवर जगात पुस्तक वाचणाऱ्या वाचकांची संख्या बंदूकधारी सैनिका पेक्षा अधिक आहे तोवर काळजीच काहीच कारण नाही.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात.पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये.म्हणून अविरतपणे प्रयत्न करणारे मार्गदर्शक, मित्र धावून येतात.प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,डॉ.दीपक शेटे,आ.भरत बुटाले,प्रा.सर्जेराव राऊत,सुभाष ढगे,अनिल फारणे,डॉ.सुधीर सरवदे ,विश्वास खाडे, विनायक पाटील,संजय कुंभार,सतीश खाडे,मनोहर सुर्वे,गणेश खंदारे,तात्या गाडेकर, दादासाहेब गाडेकर, दादासाहेब ताजणे, पुस्तकातील घटना प्रसंग सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील यांनी केलेले आहे. मला लिहिण्याची प्रेरणा देणारी पुस्तके,लेखक,प्रकाशक,मित्र ही जगावेगळी माणसं माझ्या जीवनातील महत्वाचा टप्पा आहेत.... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ.मेघा गायकवाड, चिरंजीव मयान,माझ्या धावण्यातील गुरुवर्य नामदेव बरुरे,लुल्ला शेख मोठी ताई ,लहान ताई जयश्री शिंदे या सर्वांचेच मनापासून आभार व धन्यवाद मॅट्रिक फेल विजय गायकवाड

२७/११/२२

" कोणीही तुमच्या मेंदूत सत्य ओतणार नाही.हे तुम्हाला स्वतःसाठी शोधायचे आहे." नोम चोम्स्की..

'तुम्हाला जर संधी मिळाली तर तुम्ही तुमची मुलं जाळून टाकाल,की तुमची पुस्तकं ?'असा विचित्र प्रश्न स्किनरनं त्याच्या पहिल्याच टेलिव्हिजनच्या कार्यक्रमात प्रेक्षकांना थेटपणे विचारला होता आणि इतकंच नाही,तर 'मी तर मुलांनाच जाळेन,कारण मानवी प्रगतीमध्ये माझ्या पुस्तकांमुळे माझ्या जीन्सपेक्षा जास्त योगदान मिळेल,'असंही त्या प्रश्नांचं स्वत:च सरळपणे उत्तरही दिलं होतं! अर्थातच त्याच्या या विधानावर प्रचंड गदारोळ झाला; बऱ्याच उलटसुलट चर्चाही झाल्या;

( जग बदलणारे ग्रंथ मधून सन्मापुर्वक )


… आदरणीय नमस्कार


जे तुम्ही शोधत असता ते देखील तुम्हाला शोधत असते.या प्रमाणेच आपला 'जग बदलणारे ग्रंथ' मला शोधत शोधत माझ्यापर्यंत आला.

अनुक्रमणिका वाचली आणि काहीतरी वेगळं सापडलेला भाव मला त्याच्या असण्याची जाणीव करून गेला.


सव्वीस पानांचे आदरणीय दीपा देशमुख यांचे असणारे मनोगत पुस्तकाचे महत्व,त्याच्याबद्दल अनेकांनी लिहिलेली कविता,घटना प्रसंग लेख मनाला जगण्याची उभारी देऊन गेले.


पुस्तकांचं/ग्रंथांचं महत्त्व प्राचीन काळात खूप जास्त होतं.याचं कारण आज कोणतंही पुस्तक स्वस्त आणि सहज उपलब्ध होतं.पूर्वी हस्तलिखितांच्या युगात ग्रंथ म्हणजे सोन्यापेक्षाही महाग असत.तीनशे-चारशे वर्षांपूर्वी संत एकनाथ महाराजांच्या काळात त्यांच्या 'भागवता'ची किंमत एक हजार रुपये (म्हणजे आजचे जवळजवळ अडीच ते तीन लाख रुपये) इतकी होती.एवढा पैसा खर्च करून लोक हस्तलिखित ग्रंथांचा संग्रह करीत असत.भागवत,रामायण,

महाभारत,या पोथ्या सावकारांकडे कर्जासाठी तारण म्हणून त्या काळी स्वीकारल्या जात होत्या. सोन्याचा वर्ख लावून त्या काळी ग्रंथातली अक्षरं लिहीत असत.


हे सर्व एकाच ठिकाणी व एकत्रितपणे वाचायला मिळाले व मनाला फार आनंद झाला.एकूण १८० ग्रंथांनी जग बदललं आहे. त्यातील ५० ग्रंथांची ही सांगड म्हणजे माणुसकी व मानवता यांचा शोध व सांगड घालणारी आहे. हा ग्रंथ म्हणजे समस्त मानव जातीला पडलेल्या प्रश्नाची उत्तरे आहेत.


वॉल्डन ही डेव्हिड थोरो यांची ही कादंबरी जयंत कुलकर्णी यांनी अनुवादित केलेली मी वाचलेली आहे. पण 'वॉल्डन टू' ही १९४८ मध्ये स्किनरनं प्रकाशित केलेली कादंबरी याची नोंद वाचून नवीन दृष्टिकोन तयार झाला.


एरिक फ्रामनं न्यूनगंड म्हणजे काय याविषयी अतिशय अप्रतिम असे विवेचन केलंय.

' न्यूनगंड म्हणजे मला असं वाटतंय की मला काही येत नाही असं नसून न्यूनगंड म्हणजे मला असं वाटतंय की इतरांना असं वाटतंय की मला काही येत नाही.' विचार करायला लावणारं हे विवेचन..


१८५९ मध्ये थोरोनं चार्ल्स डार्विनचं 'ओरिजिन ऑफ स्पिशिज' हे पुस्तक विकत घेऊन वाचलं.

( पुस्तक विकत घेऊन वाचणारी माणसं ही कोण असतात.ती गरीब नक्कीच नसतात ती तर श्रीमंत असतात.या तत्वाची आठवण झाली.)


या ग्रंथातील सत्याचे प्रयोग,द सेकंड सेक्स, ए ब्रिफ हिस्टरी ऑफ टाईम,इमोशनल इंटेलिजन्स, गन्स,जर्म अँण्ड स्टील,सेपियन्स:अ ब्रिफ हिस्टरी ऑफ ह्यूमन काइंड ही ग्रंथ मी वाचलेली आहेत.

हा ग्रंथ म्हणजे खरोखरच जग बदलणारा,माणूस बदलणारा ग्रंथ आहे.


आपले व मनोविकास प्रकाशनचे ( अरविंद पाटकर ) यांचे मनापासून मी आभार मानतो.सर्वोत्तम सर्वश्रेष्ठ असा हा जग बदलणारे ग्रंथ ( एकुण पृष्ठसंख्या - ४३२ ) माणसाला माणूस म्हणून विचार करायला भाग पाडतो सर्व शास्त्रज्ञांनी आपल्या आयुष्यामध्ये केलेली संशोधने,त्यासाठी त्यांना घ्यावा लागलेला त्रास त्यासाठी त्याला सोसाव्या लागलेला विरोध या सर्वांवरती विजय प्राप्त करून त्यांनी एक आदर्श समाज,आदर्श माणूस घडवण्यासाठी आपलं संपूर्ण आयुष्य खर्ची घातलं.अशा या सर्व ज्ञात अज्ञात लोकांचा जीवनपट आपण जिवंतपणे या ग्रंथाद्वारे समोर उभा केला आहे यामध्ये लेखक व प्रकाशक यशस्वी ठरलेले आहेत.

आपल्याकडून असेच सर्वोत्कृष्ट वैचारिक, बुद्धिजीवी ग्रंथांची व पुस्तकांची निर्मिती व्हावी हीच विनंती.


"कोणीही तुमच्या मेंदूत सत्य ओतणार नाही. हे तुम्हाला स्वतःसाठी शोधायचे आहे." 

नोम चोम्स्की यांच्या विचारांचा आठवण करून देणारा हा ग्रंथ आहे.आपले पुनश्च एकदा आभार धन्यवाद.

२५/११/२२

जाणून घेवू प्राण्यांबद्दल वेगळ असं काहीतरी..

माकड,शेळी,बकरी,कुत्री हे आपल्या पिलांचा आवाज चार वर्षानंतरही ओळखतात व त्याला बिलगतात.


आता जाणून घेऊया कॉफीच्या व मोहाच्या शोधाबाबत..


कॉपी व मोहाचा शोध शेळ्या व मेंढ्यामुळे लागला आहे.मध्यएशियातील ही कहाणी आहे काही शतकांपूर्वीची एकदा एक मेंढपाळ आपल्या शेळ्या बकऱ्या घेऊन चरण्यासाठी घेऊन गेला होता.त्याचं चरणं चालू असताना त्याच्या शेळ्या मेंढ्यांनी एक फळ खाल्लं आणि त्या उड्या मारायला लागल्या त्यांच्यामधील असणारी एनर्जी,त्यांच्यामधील असणारा उत्साह अचानक वाढू लागला.आणि त्या सैरावैरा इकडे तिकडे धावत जावू लागल्या,आणि उड्या मारू लागल्या त्या मेंढपाळाला काय समजेना कोणता तरी विषारी पदार्थ खाल्ल्यामुळे काय तरी होते आहे का?असा त्याला प्रश्न पडला.पण याचे उत्तर थोडावेळ थांबल्या नंतर त्याला मिळाले.

असाच थोडा वेळ गेला.आणि नंतर त्यांचा तो उत्साह त्यांचे उड्या घेणे,थांबले,आणि त्या नेहमीप्रमाणे चरायला लागल्या.अशाप्रकारे दररोज ते फळ खाल्ल्यानंतर त्यांना असंच व्हायचं उड्या मारणं सैरावैरा पळण्याचा प्रकार वारंवार बघितला आणि शेवटी त्याने निरीक्षण केलं आणि ते फळ खाऊन त्याने स्वतः खावून बघितलं,त्यानंतर त्यालासुद्धा ते फळ खाल्ल्यानंतर एक विशिष्ट प्रकारची ऊर्जा निर्माण झाल्यासारखी वाटली.आणि इथे कॉफीचा शोध लागला.


अशाच एका दिवशी हरणाने सहज मोहाची फुले खाल्ली आणि ती झिंगायाला लागली.असं दोन-तीन वेळा झाल्यानंतर माणसांनी त्याचं निरीक्षण केलं.आणि ती फुल स्वतः खाऊन बघितली आणि त्यांनाही तसेच वाटलं आणि या फुलापासून उत्तेजना निर्माण होते,झिंगायला होतं याचा त्यांना शोध लागला.तर अशाच शोधांमध्ये प्राण्याचीही भूमिका महत्त्वाचे असते.


या प्राणी जीवांच्या संवेदना,भावना, बुद्धिमत्ता,प्रेम ह्या काही वेळा स्वतः ला बुद्धिमान समजणारा 'माणूस' ही समजू शकत नाही.


एका ठिकाणी पोल्ट्री फार्म होता.ही घटना साधारणतःत्यावेळची आहे ज्यावेळी कॅमेरे नव्हते.या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अंडी निर्मितीची प्रक्रिया चालायची.व ती अंडी योग्य ठिकाणी पोहोचवली जायची.यासाठी कर्मचारी वर्ग ही मोठा होता.बरेच दिवस सर्व काही सुरळीत चाललं होतं.आणि एक दिवस नोंद घेण्यासारखी घटना घडली.त्याचं झालं काय दिवसभरामध्ये जमलेली सर्व अंडी मोजून एकत्रितपणे क्रेटमध्ये व्यवस्थित लावली जायचीत.यासाठी विशिष्ट जबाबदार व्यक्ती होती.ती या सर्व गोष्टींची नोंद घेत असे.आदल्या दिवशी सायंकाळी मोजणी झाली.त्याची नोंदणी केली.दुसऱ्या दिवशी ती अंडी ठराविक ठिकाणी पोहोचवण्यापूर्वी आणखी एकदा खात्री करण्यात आली.तर त्यावेळी २०० अंडी कमी लागली.एक दोन अंड्यांचा फरक नव्हता.तर तो फरक होता तब्बल १०० ते २०० अंड्यांचा परत दुसऱ्या दिवशी नियमाप्रमाणे काम सुरू झाले. ते सायंकाळी बंद झाले.अंड्यांची मोजणी व नोंदणी झाली.दुसऱ्या दिवशी सकाळी परत मोजली असता २०० अंडी कमी पडलीत.या प्रसंगाने संबंधित व्यक्तीला घाम फुटला.त्याला काहीच कळेना.त्यांने ही गंभीर घटना वरिष्ठांना सांगितली.त्यांनाही आश्चर्य वाटले.संशयाने सर्व लोकांची कसून तपासणी करण्यात आली. या सर्व नियमाची शिस्तबद्ध पद्धतीने अंमलबजावणी होत होती. पण तिकडेही दररोज २०० अंडी गायब होत होती. संपूर्ण रात्र पहारे ठेवण्यात आले.स्टोअरवरही 'निगराणी' ठेवण्यात आली.


इतके सगळे करूनही ठोस असे कोणतेच कारण सापडेना.सगळ्यांनी विचार केला पण काही सूचेना,ज्यावेळी आपण सर्व विचार करतो. आणि आपल्याला काही सुचत नाही.त्यावेळी आपण म्हणतो, 'की ही काहीतरी भुताटकीची भानगड आहे.भुताटकी आली कि पोटात भीतीचा गोळा आलाच.


मग एकदा रात्री एक धाडस करायचं ठरवलं स्टोअरची रात्री तपासणी करून निरीक्षण करायचे ठरले.मग रात्री उशिरा स्टोअरमध्ये जावून लाईट लावून पाहीले.सर्वकाही व्यवस्थित होते.


मग त्यांनी एक 'वेगळा' विचार केला.दुसर्‍या रात्री अंधारात या कारणाचा शोध घेण्याचे ठरले. त्याप्रमाणे त्यांनी शोध घेतला. त्यावेळी अंधारात त्यांनी जे पाहिलं. ते पाहून त्यांना आश्चर्याचा धक्का बसला.


त्यांनी अंधारात पाहीलं होत.दोन उंदीर हळूच बिळातून बाहेर यायचे.ज्या ठिकाणी अंड्याचा क्रेठ ठेवला होता.तिथेपर्यंत दोन उंदीर जायचे दोन पायांनी अंडी उचलून तिथेच जवळ असणाऱ्या टेबलावर ठेवून पायाने अंडी खाली सोडून द्यायचेत.अंडे खाली पडल्यानंतर फुटू नयेत. म्हणून विशिष्ट प्रकारचे मॅट खाली अंथरलेले असल्याकारणाने ती अंडी फुटत नव्हती.खाली पडलेली अंडी दुसरे दोन उंदीर ढकलत पुढे घेवून जात.तिथून पुढे दुसरे उंदीर अशी एक संपूर्ण टीम ((टीमवर्क म्हणजे काय अंडी फुटू नये म्हणून केले जाणारे काम याचे निरीक्षण उंदरानी केलेले होते.)त्यामुळेच हे काम हुशारीने नियोजन पध्दतीने ती करत होती.


ही काम करण्याची पद्धत ज्याला आपण टीमवर्क म्हणतो.त्या टिमवर्कचे काम हे उंदीर दिवसभर बघत असायचेत. त्याच पद्धतीने त्यानी हे काम केले होते. ही त्यांची ही काम करण्याची पद्धत (टिमवर्क) बघून त्यांची बुद्धिमत्ता पाहून सर्व लोकांना हसू आवरता आले नाही.


मग सावकाशपणे त्यांच्या बिळांचा शोध घेतला. आणि त्या ठिकाणी उकरले असता त्यांच्या बिळामध्ये शेकडो अंडी होती. काही फुटलेली, काही खाल्लेली तर काही तशीच पडलेली. त्यांची ती बिळे त्यांनी मुजवून टाकलीत. व या प्रकरणावर पडदा पडला. ही होती उंदरांच्या बुद्धिमत्तेची गोष्ट..!


दुसरी सत्य घटना आहे कोथरूडमध्ये घडलेली. असंच एक कुटुंब ज्या कुटुंबातील सर्व लोकं नोकरीनिमित्त घराबाहेर जायचे.प्रत्येक घरात फ्रिज हा असतोच तसा यांच्याही घरी फ्रीज होता.आणि त्यांनी फ्रिजमध्ये वरच्या बाजूला अंड्याच्या ट्रेमध्ये अंडी ठेवलेली असायची आणि एक दिवस अशी एक घटना घडली की ज्यामुळे त्यांना विचार करायला भाग पडलं पाच सहा अंडी होती त्यातील एक दोन अंडी ही मोकळीच होती.( त्यातील पिवला बलक गायब होता.) त्यांना आश्चर्य वाटलं अंड्याला कुठेही तडा गेलेला नाही,अंड कुठेही फुटलेले नाही वरचं कवच तळ व्यवस्थित आहे,मग आतला बलक कुठे आहे?असे प्रकार वारंवार घडायला लागले. त्यांनी याचा शास्त्रीय शोध घेण्यासाठी प्रयत्न केला पण उत्तर काय सापडेना ती नवीन अंडी आणून ठेवायचीत आणि दुसऱ्या दिवशी ती अंडी मोकळी असायचीत.आता गमंतीचा भाग सुरू होतो.एक दिवशी सुट्टी असल्यामुळे सर्वजण घरात होते. (मांजरीच्या हे लक्षात आले नाही.) आणि एक मांजर नेहमीप्रमाणेच तिथे आली तिने हळूच फ्रीजचा दरवाजा थोडाच उघडला आणि एका पायाने तो दरवाजा धरला आणि दुसऱ्या पायाच्या नखाने त्या अंड्यावर टक्क करुन एक लहान छिद्र पाडले आणि त्यातून बलग तिने ओढून घेतला.त्या मांजराने अभ्यासपूर्ण निरीक्षण केले होते,त्या घरातील लोकांची कामावर जाण्याची वेळ,फ्रीज कसा उघडतात तो कसा झाकतात कोणत्या ठिकाणी अंडे आहेत यातून तिने 'शिक्षण' घेतले होते.त्याचा न चुकता वापर करत होते.या प्रत्यक्ष बघितलेल्या घटनेमुळे त्यांना हायसे वाटले,या प्रश्नाचे अचूक उत्तरही सापडले आणि मांजरीच्या बुद्धिमत्तेचे कौतुकही त्यांना वाटले.


'निसर्गाची नवलाई' सतीश खाडे यांच्या पॉडकास्ट वरून…


★ विजय कृष्णात गायकवाड.


२३/११/२२

■ मानवतेची आठवण करून देणारी माऊली..

आज दुपारी गरगरीत बासुंदी पुरीचं जेवण मनसोक्त तुडुंब करुन,दही बुत्ती खाऊन,मस्तपैकी लावून आणलेले पान तोंडामधे धरुन,हातामधे पुढारी घेऊन,बाहेरच्या खोलीत तक्क्याला टेकून निवांत बसलो होतो.


अंगणामधे बऱ्यापैकी ऊन पसरलेलं होतं... समोरच्या रस्त्यावर दुपारची शांतता पसरलेली... एखाद दुसरी गाडी किंवा रिक्षा ये जा करत होती..


समोरच्या घराच्या नारळाच्या झाडाच्या सावलीत एक भंगारवाला आपली हातगाडी लावून तिथेच हातगाडीवर फडक्याची पुरचुंडी सोडून भाकरी आणि कसली तरी भाजी खात होता... हातगाडीवर तेल,डालडा,पावडरीचे रिकामे डबे, बियरच्या रिकाम्या बाटल्या त्याने गोळा केलेल्या वेड्यावाकड्या पडल्या होत्या...


आणखी एका घरासमोर एक बोहारीण बसलेली... समोर ती डबे-भांड्यांची टोपली ठेवलेली आणि शेजारी जुन्या कपड्यांचे गाठोडे ठेवलेले... डोक्यावरची चुंबळ तशीच डोक्यावर होती... थकली भागली जर्मनच्या तपेलीतले पाणी गळ्यातली गोटी खालीवर करत घटघट पीत होती... पदराने चेहेरा पुसत होती...


दुपारची गरम शांतता होती ती !


तेवढ्यात कानांवर आवाज आला... "जांभळं घ्या... जांभळं ! काळीभोर टप्पोरी... खास रानातला मेवा फक्त तुमच्यासाठी... "


जांभळं म्हटल्यावर ताड्कन् कॉटवरुन उठलो आणि अंगणात आलो... त्या मावशीला हांक मारली... आत बोलावले... अंगणात आली... ती दोघं होती... ती आणि तिचा नवरा ! त्याने डोक्यावरची जांभळाची पाटी जमिनीवर उतरवली आणि पाटीला बांधलेले कापड सोडले... आईशप्पथ... पाटीभर काळीभोर, टप्पोरी जांभळं ! प्युअर डायरेक्ट रानातून आलेली... दर विचारला...


मावशी म्हणाली ," १०० रु. किलो..."


आई आतून आली, "७५ ला किलो दे... तेवढ्यात मिळतायत... "


मावशी..."न्हाय ओ आज्जी... ७५ ला न्हाय मिळत आता आसली जांभळं... १०० चा दर हाय बघा... "


मी तिथेच बाजूला अंगणात सावलीत मांडी घालून बसलो होतो.हे संभाषण ऐकून मी मधे पडलो, "द्या मावशी एक किलो...  आणि दोन चार जांभळं उचलून खायला सुरुवात केली... तोवर आई घरामधे पातेलं आणायला गेली, आणि तेवढाच चान्स घेऊन मी मावशीच्या हातात १२५ रु. टेकवले आणि पट्कन तिला खुणावून लपवायला सांगितले.., तिने पण ते पट्कन लुगड्याच्या केळ्यात लपवले...


आई पातेलं घेऊन आली... ते तराजू मी हातात घेतला आणि अर्धा अर्धा किलोचे दोन वेळा वजन करुन एक किलो जांभळं वजन करुन पातेल्यात ओतली... मी अजून सहा सात जांभळं हातामधे घेतली आणि मस्तपैकी अंगणातच मांडी घालून खात बसलो.


आई पातेलं आत ठेवायला गेली तेवढ्यात मावशी म्हणाली, "दादा, वाईच दोन घास खाऊन घेतो इथं बाजूला सावलीत बसून !"


"बसा ओ मावशी... घ्या जेवण करुन निवांत !"


सैय्याला सांगून त्यांना छोट्या कळशीतून पाणी दिले... आईने दोन वाट्या बासुंदी आणि चार पाच पुऱ्या आणून दिल्या.


मावशीने तिची ती फडक्यात बांधलेले दुपारचे जेवण सोडले... मस्तपैकी तीन चार दशम्या दिसल्या मला... त्यात छानपैकी तेलात भिजवलेली लसणाची चटणी... तो तेलसर लाल रंग भाकरीच्या तलम पापुद्र्यावर पसरलेला... दुसऱ्या एका छोट्या डब्यातून तिने वांग्याची रस भाजी काढली... दोघांच्या मधे तिने ते कापड पसरले दोन भाकऱ्या नवऱ्याला आणि एक स्वतःसाठी घेतली... दोघांनीही काही सेकंद डोळे मिटून नमस्कार केला आणि शांतपणे जेवायला सुरुवात केली... जेवण झालं... मावशींनी सगळं आवरलं... जिथे ते दोघे जेवले तिथल्या फरशीवर पाणी शिंपडून जागा स्वच्छ केली... पाण्याची कळशी विसळून दरवाज्यात ठेवली... बासुंदी पुरी दिलेला वाट्या आणि ताटली स्वच्छ करुन कळशीला टेकवून ठेवली आणी घटकाभर अंगणातल्या आंब्याच्या झाडाखाली तसेच बसून राहिले...


तिच्या नवऱ्याने चंची उघडली... अडकित्त्याने सुपारी कातरुन मला दिली आणि स्वतःही तोंडात टाकली... पाच सहा नागवेलीची पाने हातामधे घेऊन तळव्यावर पसरुन ठेवली... अंगठ्याची नखुली पानांच्या शिरांवर हळूवार फिरवत त्याने शिरा मऊ केल्या... केशरी चुना अंगठ्यावर घेऊन छानपैकी पानांवर लावला आणि पानाची घडी माझ्याकडे सरकवली... आपणही खाल्ली... वर काथाचे तुकडे दिले आणि नंतर छानपैकी काळी तंबाखू लयदार मळून चिमूटभर मला देऊन आपणही तोंडात डावीकडे बारीक गोळी ठेवली. मस्त समाधान उतरलं !


पाचदहा मिनीटानंतर ती दोघेही निघायला उठली... तिने आईला हांक दिली, "आज्जी... आमी जातोय हं !"


आईने आतून,"थांब गं जरा दोन मिंटं !" सांगून थांबायला सांगितले.


आई बाहेर आली. आईच्या हातामधे हळदकुंकवाचा करंडा आणि छोटा स्टीलचा डबा होता. आईने तिला हळद-कुंकू लावले,तिनेही आईला लावले आणि आईने हातातला स्टीलचा डबा तिला देत सांगितले, "यात बासुंदी आहे वाडीची ! संध्याकाळी घरी गेल्यावर तुझ्या मुलांना दे खायला  !"


ती नको नको म्हणत असताना आईने तो डबा तिच्या पाटीमधे ठेवला.


ती दोघेही पुढे आली आणि वाकून आईला नमस्कार केला... "माऊली... माऊली..." असं काहीसं पुटपुटले !


आई आतमधे गेली... ती दोघे माझ्याकडे आली, "दादांओ...!" म्हणत खाली वाकली माझ्या पायाला स्पर्श केला !


मी थोडा दचकलो... पट्कन् मी ही वाकून त्यांच्या पावलांना स्पर्श करत असताना नकळत पणे माझ्या तोंडातून बाहेर आले, "माऊली... माऊली !"


त्याने खिशात हात घालून छोटी कागदाची पुडी काढली, उघडली ! आत मधे बुक्का होता... चिमटीत बुक्का घेत त्याने माझ्या कपाळावर टेकवला आणि म्हणाला, "दादा, लै शिरीमंत हायसा बगा तुमी ! आवो,माऊली नांदतीया तुमच्या घरात... !" नंतर त्याने दरवाजाच्या उंबऱ्यावर डोकं टेकवले आणि मागे वळून पाटी उचलून मावशीच्या डोक्यावर ठेवली,पिशवी हातामधे घेतली... आणि गेट उघडून दोघेही मला पाठमोरे होऊन लांब लांब जायला लागले... वाऱ्यावर विरत जाणारा मावशींचा आवाज येत होता कानांवर...


"जांभळं घ्या... जांभळं ! काळीभोर टप्पोरी... खास रानातला मेवा फक्त तुमच्यासाठी..


लेखक - अनामिक


कोल्हापूरचे आमचे मित्र विनायक पाटील यांनी ही कथा मला पाठवून जतन करायला सांगितली.

२१/११/२२

निकोलस कोपर्निकस Nicholas Copernicus (१९ फेब्रु. १४७३ १५४३)

२४ मे पोलंड मधील टोरून येथे जन्मलेल्या या प्रतिभावंताने लॅटीन आणि ग्रीक भाषेत आपले शिक्षण पूर्ण केले. इटलीतील बोलोन्या विद्यापीठात त्यांनी गणित,पदार्थविज्ञान आणि खगोलशास्त्राचा अभ्यास केला.कोपर्निकसचे इटलीतील प्रमुख विद्यापीठांशी,चर्च तसेच चर्चचे प्रमुख पोप यांच्याशी सौहार्दाचे संबंध होते. या संबंधाचा त्याला जसा फायदा झाला तसाच तोटाही सहन करावा लागला. 'सर्व विश्वाचा मध्यबिंदू पृथ्वी की सूर्य ?' हा एक वादाचा मुद्दा कोपर्निकसने चर्चेत आणला होता. सॅमोस येथील अरिस्टार्कस याने मांडलेला 'सूर्यकेंद्रित' म्हणजे सूर्याभोवती पृथ्वी फिरते हा सिद्धांत मागे पडलेला होता.सन १५०० सालापर्यंत 'पृथ्वीकेंद्रित' टॉलेमी-ॲरिस्टॉटलचा सिद्धांत धर्माच्या छायेखाली टिकून होता.


टॉलेमीपासून चालत आलेली पृथ्वीकेंद्रित सिद्धांताची कल्पना कोपर्निकसला अपुरी वाटत होती. त्याच्या विचारांची दिशा प्रथमपासूनच प्रचलित

मतांविरुद्ध,पृथ्वीकेंद्रित सिद्धांताविरुद्ध होती.अनेक वर्षे त्याने आपल्या मतप्रणालीवर निरीक्षणपूर्वक चिंतन केले. सूर्य स्थिर असून पृथ्वीसह इतर सर्व ग्रह त्याभोवती फिरतात हे त्याने १५१० साली एका लेखाद्वारे मांडले. सदर लेख 'कॉमेंटरी ऑलस' या लहान टीकात्मक पुस्तकातून पुढे आला. हे पुस्तक १५१४ च्या आसपास प्रसिद्ध झाले. सदर पुस्तक पोप क्लीमेंटच्या निदर्शनास आल्यावर हा संपूर्ण सिद्धांत प्रसिद्ध करावा म्हणून त्याने सूचना केली. त्याचप्रमाणे प्रोटेस्टंट पंथातल्या फॉन लॉखन अर्थात ऱ्हेटिकस यानेही कोपर्निकसला संपूर्ण पुस्तक लिहिण्यास गळ घातली. पण आपले मत ग्रंथरूपाने प्रसिद्ध करण्यासंदर्भात कोपर्निकसला उत्साह वाटत नव्हता. राजसत्ता, धर्मसत्ता आणि पोप यांची भीती त्याला सतावत होती.


कोपर्निकस हा धर्मनिष्ठ होता. प्रस्थापित मतांना एकदम धक्का द्यावा असे त्याला वाटत नव्हते. पण सत्य लपवून ठेवावे हेही त्याच्या मनात येईना. शेवटी हेटिकसने पुस्तकाच्या प्रकाशनाचे काम हौसेने अंगावर घेऊन छपाईचे कामही चालू केले. दरम्यान जुलै १५४० मध्ये ॲड्रियस ओसियांडर या आपल्या मित्राला पत्र लिहून कोपर्निकसने पुस्तक प्रसिद्ध करण्यासंदर्भात सल्ला विचारला. सिद्धांत सत्य असल्याचा दावा न करता गृहितक मानले तर टीकेला तोंड देता येईल असे ओसियांडरचे मत होते. पण कोपर्निकसला आपला सिद्धांत सत्य असल्याची खात्री असल्यामुळे अशा तऱ्हेची तडजोड त्याला मान्य होण्यासारखी नव्हती. पुस्तकाची छपाई सुरु असताना कोपर्निकस मात्र अंथरूणावर खिळून होता.


इ. स. १५४३ मध्ये 'ऑन द रिव्होल्यूशन्स ऑफ द सेलेस्टीअल ऑब्जेक्टस' (On the Revolutions of the Celestial Objects) ही स्वतःच्या पुस्तकाची प्रत हातात आली तेव्हा कोपर्निकसला धक्काच बसला. असे म्हणतात की, आपल्या सिद्धांताला विरोधी प्रस्तावना पाहून १५४३ मध्ये काही तासातच कोपर्निकसचा मृत्यू झाला. हे खळबळजनक पुस्तक पोपला समर्पित केलेले होते.कोपर्निकसच्या मृत्यूनंतर या पुस्तकाची प्रस्तावना एक चर्चेचा विषय ठरली. कारण प्रस्तावनेत सूर्यकेंद्रित सिद्धांत ठामपणे मांडलेला नव्हता तर एक गृहितक म्हणून वापरावा,ज्यायोगे गणितातील निष्कर्ष काढणे सोपे होईल एवढेच त्यात म्हटलेले होते.


गेल्या शतकाच्या शेवटी प्रागमध्ये कोपर्निकसचे स्वतःचे हस्तलिखित सापडले. त्याला शीर्षक नाही, प्रस्तावना नाही. किंबहुना हस्तलिखित आणि प्रकाशित आवृत्तीमध्ये अनेक बदल झालेले होते. हे बदल करण्यामध्ये हेटिकस अथवा ओसियांडरचा हात होता हे निश्चितच. प्रस्तावना बदलली म्हणून एखाद्याचे विचार मात्र कोणीही बदलू शकत नाही. कोपर्निकसच्या या क्रांतिकारी सिद्धांताने त्याच्या मृत्यूनंतर सोळाव्या आणि सतराव्या शतकात धर्मामध्ये खळबळ उडवून दिली. त्याच्या सिद्धांताला धर्ममार्तंडांनी विरोध तर केलाच पण काही खगोल वैज्ञानिकांनीही विरोध केला.अर्थात दोहोंच्या विरोधामध्ये गुणात्मक फरक होता. खगोलवैज्ञानिकांचा विरोध हा निरीक्षण आणि पुराव्याशी निगडीत होता.


सफर विश्वाची - डॉ.नितीन शिंदे

नागनालंदा प्रकाशन इस्लामपूर


१९/११/२२

बर्म्युडा ट्रेंगल - गूढ रहस्य की निसर्गाची कमाल?

अँटलांटिक महासागरात फ्लोरिडा,बर्म्युडा आणि प्यूर्टोरिको या तीन ठिकाणांना जोडणारा एक भाग या समुद्रात आहे.त्रिकोणाकृती असलेल्या या भागाला 'बर्म्युडा ट्रॅगल' म्हटलं जातं.हाच भाग डेव्हिल्स ट्रेंगल या नावानंसुद्धा कुप्रसिद्ध आहे. त्याला कारणही तसंच आहे.या भागात अनेक विमानं तसंच मोठमोठी जहाज गायब झाली आहेत.त्यांचा तसंच त्यावरचे कर्मचारी तसंच प्रवासी यांचा नंतर काहीही ठावठिकाणा लागला नाही.कित्येक वर्षं हे सगळं गूढ बनून राहिलं होतं.त्याविषयी विविध तर्कवितर्क केले अनेक अफवा उठल्या.समुद्री चाच्यापासून अगदी परग्रहावरच्या जिवांपर्यंत (एलियन्स) असे सर्व अंदाज लोकांनी बांधले.असं काय रहस्य होतं त्या भागात ?


'बर्म्युडा ट्रॅगल'ची ओळख तशी जुन्या काळापासून होती.अनेक दर्यावर्दींना या भागात काहीतरी रहस्यमयी आहे हे लक्षात आलं होतं. ५०० वर्षांपूर्वी ख्रिस्तोफर कोलंबस जेव्हा पहिल्यांदा जगप्रवासाला निघाला तेव्हा त्यानं प्रथम याचा उल्लेख केला होता.१४९२ साली या भागातून जात असताना त्यान अद्भुत आणि भयावह असं काही तरी बघितलं.एका रात्री त्यानं या भागात आगीचा एक प्रचंड असा आगडोंब बघितला.त्याच्याकडचं होकायंत्र विचित्र प्रकारे दिशा दाखवत होते.वादळ नसतानाही प्रचंड मोठ्या लाटा तिथं उसळत होत्या.


१९१८ मध्ये 'यू.एस.एस.सायक्लोप्स' (USS cyclops) हे जहाज बार्बाडोसमधून 'मँगनीज' हे खनिज घेऊन निघालं.३०९ कर्मचाऱ्यांना घेऊन निघालेलं हे जहाज रहस्यमयरीत्या अदृश्य झालं. नंतर त्या जहाजाचा आणि त्यावरच्या कर्मचाऱ्यांचा शोध लागला नाही. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात प्रोटिअस आणि नेरिअस ही दोन जहाजं तेच मँगनीज खनिज वाहून नेताना याच भागात बेपत्ता झाली आणि त्यांचाही पुढे शोध लागला नाही.५ डिसेंबर १९४५ रोजी या भागात घडलेल्या अजून एका गूढ घटनेनं साऱ्या जगाचं लक्ष वेधून घेतलं! अमेरिकन नौदलाची 'फ्लाईट १९' ही पाच 'टीबीएम अँव्हेजर (TBM Avenger) या बॉम्बर्स विमानांची तुकडी प्रशिक्षणासाठी या भागावरून जात होती.ही संपूर्ण तुकडी तिथं गायब झाली.त्या घटनेनंतर लगेचच या विमानांची शोधाशोध सुरू झाली.अनेक विमानं त्यासाठी रवाना झाली.त्यापैकी एक असलेलं 'पीबीएम मरीनर' (PBM Mariner) हे विमान त्यातल्या १३ कर्मचाऱ्यांसह याच ठिकाणी बेपत्ता झालं.यापैकी कोणत्याच विमानाचा शोध लागला नाही.


फ्लोरिडाच्या किनाऱ्यावरच्या एका जहाजावरच्या कर्मचाऱ्यांनी त्या वेळी आकाशात मोठे स्फोट झाल्याचं सांगितलं होतं.त्यानंतर तिथं मोठं वादळही आलं होतं.शेवटी वाट चुकल्यानं आणि वादळात सापडल्यानं ही विमानं अपघातग्रस्त झाली असावीत,असा निष्कर्ष अमेरिकन नौदलाकडून काढण्यात आला. बर्म्युडा ट्रँगलमध्ये गायब झालेल्या अथवा दुर्घटनाग्रस्त झालेल्या जहाजं विमानांची यादी फार मोठी आहे. ७५ च्या आसपास विमानं तर १०० हून अधिक जहाजं इथं गायब झाल्याचं सांगितलं जातं.या भागातून जाणारी जहाजं किंवा विमानं अत्यंत रहस्यमयरीत्या बेपत्ता होतात आणि त्यांचा कुठंच शोध लागत नाही हे प्रत्येक घटनेनंतर सिद्ध होत गेलं.


अनेक वैज्ञानिक यामागचं नेमकं कारण शोधण्याचा प्रयत्न करत होते.शतकानुशतकं हे प्रयत्न चालू होते.पण त्यांना यश न मिळाल्यानं यामागचं गूढ वलय आणखीनच दाट होत गेलं. भुताखेतांचा वावर,समुद्री चाच्यांची लूटमार, परग्रहावरचे जीव अर्थात एलियन्स,चक्रीवादळ, मानवी चुका,होकायंत्रात होणारे बदल तसंच या क्षेत्रात असलेलं मिथेन हायड्रेट्सचं जास्त प्रमाण अशा एक ना अनेक शक्यता वर्तवल्या गेल्या. तरी खात्रीशीर असं कुठलंही कारण सापडत नव्हतं.अलीकडच्या काळात शास्त्रज्ञांच्या एका संशोधनादरम्यान मात्र हे रहस्य उलगडलं आहे. निदान तसा दावा तरी आहे.या दाव्याप्रमाणे त्या भागात षटकोनी ढगांची निर्मिती होते आणि हे ढग एखाद्या 'एअरबॉम्ब'सारखं काम करतात.या ढगांमध्ये मेकॅरोबर्स्ट तयार होऊन ते वेगानं समुद्रावर आदळतात.त्यामुळे तिथं २५० किमी प्रतितास यापेक्षाही अधिक वेगानं वारे वाहतात आणि प्रचंड मोठ्या लाटा निर्माण होतात. त्यामुळे विमानं आणि जहाजं तिथून पुढे जाऊ शकत नाही आणि तिथंच गायब होतात असं या नव्या संशोधनात सांगितलं गेलं आहे.


'प्रवास' या पुस्तकातून अच्युत गोडबोले व आसावरी निफाडकर,मधुश्री पब्लिकेशन