* विजय गायकवाड | Vijay Gaikawad

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

२५/२/२३

प्राचीन भारतीय ज्ञानपीठं…

इसवी सनाच्या दहाव्या शतकात,अर्थात इ.स. १००० मध्ये,भारत हा जगातली सर्वांत मोठी आर्थिक शक्ती होता.जागतिक व्यापारात भारताचा वाटा हा २९% पेक्षा जास्त होता असे प्रख्यात अर्थशास्त्री प्रोफेसर अंगस मेडिसन यांनी लिहून ठेवलं आहे. (सध्या जागतिक व्यापारात १४.४% वाटा असलेला चीन पहिल्या क्रमांकावर आहे.अर्थात या बाबतीत भारताचा 'विक्रम' कोणीही मोडू शकलेला नाही..!) 'बेरेनाईक प्रकल्पा' सारख्या ठिकाणांमधून भारताच्या ह्या जागतिक व्यापाराचे अनेक प्रत्यक्ष पुरावे मिळतात.


याचा दुसरा अर्थ,भारताची निर्यातक्षमता प्रचंड होती.'फक्त भारतातून केलेल्या आयातीच्या 'कमिशन'मधून युरोपातली शहरं समृद्ध होत होती'असं युरोपियन इतिहासकारांनीच लिहून ठेवलं आहे..


अर्थातच त्या काळात भारतात तशा क्षमतेची माणसं,

तंत्रज्ञ,कामगार,व्यापारी,संशोधक असतील,तेव्हाच तर जागतिक व्यापारातील हे स्थान भारताला प्राप्त करता आले.आणि जर ही अशी कुशल माणसं भारतात असतील,तर ती तयार कशी होत असतील..? त्यांच्या प्रशिक्षणाची काय व्यवस्था असेल..? असे अनेक प्रश्न समोर उभे राहतात.


इंग्रज इतिहासकारांनी असे चित्र निर्माण करून ठेवलंय की त्यांनीच भारतात शिक्षणपद्धत रुजवली शाळा काढल्या,कॉलेज उभारली वगैरे इंग्रज येण्यापूर्वी भारतात फक्त संस्कृतचं आणि पौरोहित्याचं शिक्षण मिळत होतं असा (गैर) समज फार मोठ्या प्रमाणात समाजात पसरलाय.


याशिवाय 'इंग्रज येण्यापूर्वी शिक्षण फक्त ब्राम्हणांना आणि तेही पुरुषांना उपलब्ध होतं' असाही एक खूप मोठा (गैर) समज पसरवून ठेवण्यात आलाय.दुर्दैवानं काही भारतीय इतिहासकारांनी आणि समाजात काम करणाऱ्या तथाकथित 'सेक्युलर' लोकांनीही,इतिहासाचा धांडोळा न घेता याच विचारांची री ओढलेली दिसते.आता हे जर खरं असेल तर एक हजार वर्षांपूर्वी भारताचा जागतिक व्यापारात जवळपास एक तृतीयांश वाटा कसा काय असू शकतो,याबाबत कोणीच काही सांगत नाही...!


मात्र इतिहासाचे एक एक पुरावे बघत आपण पुढे जाऊ लागलो की जे चित्र दिसते,ते फारच वेगळे,भव्य आणि अभिमान वाटावा असे आहे.इंग्रज आणि मुस्लीम आक्रमक येण्यापूर्वी या देशात जी शिक्षणपद्धती होती,तिची तोड जगात कुठेही दिसत नाही.अत्यंत व्यवस्थित रचलेली ही पद्धत,आवश्यक त्या सर्व क्षेत्रांत ज्ञान आणि प्रशिक्षण देत होती.


जगातले पहिले विद्यापीठ (विश्वविद्यालय - युनिव्हर्सिटी) हे भारतात प्रारंभ झाले,हे किती लोकांना माहीत आहे..? त्या काळात भारतात 'अशिक्षित' असा प्रकारच नव्हता,हेही किती लोकांना माहीत आहे..? आज आपली मुलं शिकायला वेगवेगळ्या देशांत जातात.मात्र त्या काळात वेगवेगळ्या देशांतली मुलं भारतात शिकायला येत होती,परंतु एकही भारतीय मुलगा शिकायला बाहेर जात नव्हता,हेही किती लोकांना माहीत आहे..?


प्रख्यात सूफी संगीतकार,गायक,कवी आणि 'कव्वाली'चा जनक अमीर खुस्रो (सन १२५२ - १३२५) हा जेव्हा भारताच्या विद्यापीठांमध्ये आला,तेव्हा भारतावर मुस्लीम आक्रमकांचे आक्रमण होऊन त्यांचा जम बसायला लागला होता.साहजिकच तो काळ,भारतीय विद्यापीठांचा पडता काळ होता.मात्र तरीही अमीर खुस्रोने भारतीय शिक्षणाबद्दल आणि येथील विद्यापीठांबद्दल जे लिहून ठेवलंय ते अफाट आहे.भारतीय शिक्षणपद्धतीची खुस्रोने बरीच प्रशंसा केलेली आहे.


मुलांच्या 'अरबी सुरस आणि चमत्कारिक' गोष्टींचा नायक हारून अल रशीद हा बऱ्याच आधीचा.सन ७५४ ते सन ८४९ ह्या काळातला. याने आणि अरबी सुलतान अल मन्सूरने भारतीय विद्यापीठांतून हुशार मुलांना घेऊन येण्यासाठी आपले दूत पाठवले होते अशा नोंदी बऱ्याच ठिकाणी आढळतात.


हा भारतातला पहिला ज्ञात 'कॅम्पस इंटरव्ह्यू'..! सुमारे बाराशे वर्षांपूर्वीचा..!!


मुस्लीम आक्रमक भारतात येण्याआधी भारतात परिपूर्ण शिक्षणप्रणाली होती.या संदर्भात अनेक पुरावे उपलब्ध आहेत. मुला / मुलींना साधारण आठव्या वर्षापर्यंत घरीच शिकवलं जायचं. आठव्या वर्षी त्याचा उपनयन संस्कार झाला की त्याला गुरुकुलामध्ये किंवा गुरूकडे पाठविण्याची पद्धत होती.येथे 'गुरू' म्हणजे फक्त संस्कृत शिकविणारे ऋषी असा अर्थ कदापि नाही. 'गुरू' हा त्या त्या क्षेत्रातला दिग्गज माणूस असायचा. समुद्रकिनाऱ्यावरच्या बऱ्याच कुटुंबांमधील मुलं ही जहाज बांधणाऱ्या आपल्या गुरूकडे राहून, जहाजबांधणीचं प्रत्यक्ष शिक्षण घेत.हीच पद्धत धनुर्विद्या,मल्लविद्या,

लोहारकाम,वास्तुविद्या वगैरेसारख्या गोष्टी शिकण्यासंबंधी होती.साधारण ८-१० वर्षे गुरूकडे शिक्षण घेतल्यानंतर यातील काही विद्यार्थी विद्यापीठात पुढील उच्च शिक्षणासाठी जात.या विद्यापीठांमध्ये वेगवेगळी शास्त्रं आणि कला शिकण्याची व्यवस्था होती. पुढे मुसलमान आक्रमकांनी ही विद्यापीठं नष्ट केली.त्यामुळे इसवी सन १२००-१३०० नंतर ह्या विद्यापीठांचं अस्तित्वच नष्ट झालं.मात्र - तरीही गुरुगृही शिकण्याची परंपरा बऱ्याच अंशी कायम राहिली.


या आक्रमणापूर्वीच्या काळात स्त्रियांनी शिकण्याची पद्धत आणि परंपरा होती.ऋग्वेदात स्त्रीशिक्षणाचे उल्लेख अनेक ठिकाणी आढळतात.प्रारंभिक शिक्षण घेतलेल्या स्त्रियांना 'ऋषिका' आणि उच्च शिक्षण घेतलेल्या स्त्रियांना 'ब्रम्हवादिनी' म्हटले जायचे.

ऋग्वेदात अशा ऋषिका आणि ब्रम्हवादिनी स्त्रियांची नावेच दिलेली आहेत.


रोमासा,लोपामुद्रा,अपला,कद्रू,घोष,गौपयना,

जुहू,वागंधिनी,पौलोमी,जरिता, श्रद्धा,

कामायनी,उर्वशी,सारंगा,यमी,इंद्रायणी, सावित्री,देवजयी,नोधा,सिकातनीबावरी, अक्रीष्ट्रभाषा,इत्यादी.अशी २३ नावं दिलेली आहेत..


पाणिनीने त्याच्या ग्रंथात मुलींच्या शिक्षणासंबंधी लिहून ठेवलंय.मुलींकरिता वसतिगृहं (होस्टेल्स) होती.त्यासाठी पाणिनीने 'छत्रीशाळा' हा शब्द वापरलाय.उपनिषद काळात गार्गी आणि मैत्रेयी या विदुषींचा उल्लेख येतो.एकुणात काय,तर मुस्लीम आक्रमणापूर्वीच्या भारतात स्त्रीशिक्षणाचे प्रमाण फार चांगले होते.स्त्रिया मोकळेपणी समाजात मिसळत होत्या.


शिक्षकांची किंवा गुरूंची ही मोठी परंपरा होती, जी शतकानुशतकं चालत आलेली होती. आचार्य/ उपाध्याय /चरक/ गुरू/यौजनासातिका/ शिक्षक अशा वेगवेगळ्या उपाध्या गुरूंसाठी होत्या.


विद्यापीठांमध्ये शिक्षण सत्र प्रारंभ होण्याचा तसेच सत्र संपण्याचाही मोठा उत्सव असायचा.सत्रारंभ सोहोळ्याला 'उपकर्णमन' आणि सत्र समापन सोहोळ्याला 'उत्सर्ग' म्हटले जायचे. उपाधी प्रदान सोहोळ्याला (ज्याला आपण 'ग्रॅज्युएशन सेरेमनी' म्हणतो), 'समवर्तना' म्हणायचे.

सुट्टयांसाठी 'अनध्याय' हा शब्द वापरला जायचा.

वर्षभरातील प्रमुख अनध्याय होते महिन्यातील दोन्ही अष्टम्या,दोन्ही चतुर्दशी, अमावस्या,पौर्णिमा आणि चातुर्मासातला शेवटचा दिवस.या नित्य अनध्यायांशिवाय नैमित्तिक अनध्यायही असायचे.अर्थातच आजच्यासारखी 'रविवारी सुटी' ही भानगड नव्हती.गंमत म्हणजे,भारतीय संस्कृतीचा प्रसार ज्या दक्षिण पूर्व आशियाई देशांमध्ये,उदा - लाओस,कंबोडिया,जावा-सुमात्रा (इंडोनेशिया), सयाम (थायलंड)- झाला,त्या सर्व देशांमध्ये अगदी अलीकडल्या काळापर्यंत अनध्यायाचे दिवस हे प्राचीन भारतीय पद्धतीप्रमाणेच होते. -


तक्षशीला विद्यापीठ


जगातील पहिले विश्वविद्यालय (विद्यापीठ) हे 'तक्षशीला' मानले जाते.आजच्या पाकिस्तानात (रावलपिंडीपासून १८ मैल उत्तरेकडे) असलेले हे विद्यापीठ इसवी सनाच्या सातशे वर्षांपूर्वी स्थापन करण्यात आले. पुढे इसवी सन ४५५ मध्ये 'पूर्व युरोप' च्या आक्रमकांनी,अर्थात 'हूणांनी' ते नष्ट केले.जागतिक स्तरावर ख्याती असलेल्या ह्या विद्यापीठाने सुमारे १२०० वर्षं ज्ञानदानाचे मोठे काम केले.श्रेष्ठ आचार्यांची परंपरा निर्माण केली,अनेक जगप्रसिद्ध विद्यार्थी दिले.तक्षशीला विद्यापीठ बंद पडल्यानंतर काही वर्षांतच मगध राज्यात (आजच्या बिहारमधे), नालंदा विद्यापीठ स्थापन झाले.


ही दोन्हीही नामांकित विद्यापीठ एकाच वेळेस कधीही कार्यरत नव्हती.


असे म्हणतात,तक्षशीला ह्या नगरीची स्थापना भरताने त्याच्या मुलाच्या,'तक्षाच्या' नावावर केली.पुढे येथेच विद्यापीठ स्थापन झाले.जातक कथांमध्ये तक्षशीला विद्यापीठासंबंधी बरीच माहिती मिळते.ह्या कथांमध्ये १०५ ठिकाणी ह्या विद्यापीठाचे संदर्भ मिळतात.त्या काळात, अर्थात सुमारे हजार वर्षे,तक्षशीला ही संपूर्ण भरतखंडाची बौद्धिक राजधानी होती.तिची ही ख्याती ऐकूनच 'चाणक्य' सारखी व्यक्ती मगध (बिहार) हून इतक्या दूर तक्षशीलेला आली.बौद्ध ग्रंथ 'सुसीमजातक' आणि 'तेलपत्त' मध्ये तक्षशीलेचे अंतर काशीपासून २००० कोस सांगितले आहे.


इसवी सनाच्या पाचशे वर्षांपूर्वी,जेव्हा 'चिकित्सा' शास्त्राचे नाव सुद्धा जगात कुठेच नव्हते,तेव्हा तक्षशीला विद्यापीठ हे चिकित्साशास्त्राचे फार मोठे केंद्र मानले जात होते.येथे ६० पेक्षा जास्त विषय शिकवले जात होते.एका वेळेस १०,५०० विद्यार्थ्यांना शिकण्याची सोय होती.


तक्षशीला विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांची फार उज्वल परंपरा आहे. -


 या विद्यापीठाच्या स्थापनेनंतर,अर्थात इसवी सनापूर्वी ७०० वर्ष,येथून शिकून गेलेला पहिला प्रसिद्ध विद्यार्थी म्हणजे पाणिनी,ज्याने संस्कृतचे व्याकरण तयार केले.


इसवी सनापूर्वी सहाव्या शतकात, चिकित्साशास्त्र शिकलेला 'जीवक' (किंवा 'जिबाका'), पुढे जाऊन मगध राजवंशाचा राजवैद्य झाला.याने अनेक ग्रंथ लिहिले.


इसवी सनापूर्वी चौथ्या शतकातील अर्थशास्त्राचा विद्यार्थी 'चाणक्य', जो पुढे 'कौटिल्य' नावाने प्रसिद्ध झाला. चिनी यात्री आणि विद्यार्थी, 'फाह्यान' हा सन ४०५ मधे तक्षशीला विद्यापीठात आला.हा काळ ह्या विद्यापीठाचा पडता काळ होता.पश्चिमेकडून होणाऱ्या आक्रमकांच्या संख्येत वाढ झाली.अनेक आचार्य विद्यापीठ सोडून गेले.अर्थातच फाह्यानला तेथे फार काही ज्ञानाचा लाभ झाला नाही.त्याने तसे लिहून ठेवलंय.पुढे सातव्या शतकात, तक्षशीलासंबंधी वर्णनं ऐकून आणखी एक चिनी यात्री,'ह्युएन त्सांग' तेथे गेला,तर त्याला विद्याभ्यासाची कसलीही खूण आढळली नाही.


नालंदा विद्यापीठ


हूण आक्रमकांनी ज्या काळात तक्षशीला विद्यापीठ उद्ध्वस्त केले,जवळपास त्याच काळात मगध साम्राज्यात नालंदा विद्यापीठाची मुहूर्तमेढ रोवली जात होती.मगधाचे महाराज 'शकादित्य' (अर्थातच गुप्तवंशीय सम्राट कुमार गुप्त : सन ४१५ ते ४५५) यांनी आपल्या अल्पकाळात नालंदामधील जागेला विद्यापीठाच्या रूपात विकसित केले. या विद्यापीठाचे सुरुवातीचे नाव होते - 'नलविहार'. 


पुढे इसवी सन ११९७ मध्ये बख्तियार खिलजीने हे विद्यापीठ जाळून टाकेपर्यंत सुमारे सातशे वर्षं, हे जगातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठ होते.


ह्या विद्यापीठात प्रवेशासाठी कठोर परीक्षा द्यावी लागत असे.अनेक दुर्लभ आणि दुर्मीळ ग्रंथांचा प्रचंड मोठा संग्रह ह्या विद्यापीठात होता.'चिनी यात्री 'ह्युएन त्सांग' येथे दहा वर्षं अध्ययन करत होता.त्याचा गुरू शीलभद्र हा आसामचा होता. ह्युएन त्सांगने ह्या विद्यापीठाबद्दल भरभरून आणि खूप चांगले लिहिले आहे.


नालंदा विद्यापीठ हे अनेक इमारतींचं एक फार मोठं संकुल होतं.यातील प्रमुख भवनं होती - रत्नसागर,रत्नोदधी आणि रत्नरंजक.सर्वांत उंच प्रशासकीय भवन होतं 'मान मंदिर'.


विक्रमशील विद्यापीठ


आठव्या शतकात बंगालचा पालवंशीय राजा धर्मपालने ह्या विद्यापीठाची स्थापना आजच्या बिहारमधे केली होती.ह्या विद्यापीठाच्या अंतर्गत ६ विद्यालयं होती.प्रत्येक विद्यालयात १०८ शिक्षक होते.दहाव्या दशकातील प्रसिद्ध तिब्बती लेखक तारानाथने ह्या विद्यापीठाचं विस्तृत वर्णन केलेलं आहे.ह्या विद्यापीठात प्रत्येक दाराला एक एक प्रमुख आचार्य नियुक्त होते.नवीन प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची हे आचार्य परीक्षा घ्यायचे.त्यांच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनाच विद्यापीठात प्रवेश मिळत असे.हे आचार्य होते- पूर्व द्वार - पं. रत्नाकर शास्त्री,पश्चिम द्वारवर्गाश्वर कीर्ती,उत्तरी द्वार - नारोपंत आणि दक्षिणी द्वार प्रज्ञाकर मित्रा,यांतील नारोपंत हे महाराष्ट्रातून आलेले होते.आचार्य दीपक हे विक्रमशील विद्यापीठाचे सर्वाधिक प्रसिद्ध आचार्य झालेले आहेत.



बाराव्या शतकात येथे ३,००० विद्यार्थी शिकत होते.हा या विद्यापीठाचा पडता काळ होता. पूर्वेत आणि दक्षिणेत मुसलमान आक्रमक पोहोचत होते आणि मिळेल ती ज्ञानाची साधनं आणि स्थानं उद्ध्वस्त करत होते.म्हणूनच उत्खननात जे अवशेष सापडले आहेत,त्यांवरून असं लक्षात येतं की,विद्यापीठाच्या मोठ्या सभागृहात ८,००० लोकांची बसायची व्यवस्था होती.


या विद्यापीठात परदेशी विद्यार्थ्यांमध्ये तिब्बती विद्यार्थ्यांची संख्या सर्वांत जास्त होती. त्याचं एक कारण म्हणजे बौद्ध धर्माच्या 'वज्रयान' संप्रदायाच्या अभ्यासाचं हे महत्वाचं आणि अधिकृत केंद्र होतं.


नालंदा विद्यापीठ उद्ध्वस्त झाल्यानंतर,सुमारे सहा वर्षांनी,अर्थात सन १२०३ मध्ये,नालंदा जाळणाऱ्या बख्तियार खिलजीनेच ह्या विद्यापीठालाही जाळून टाकलं.


उड्डयंपूर विद्यापीठ


पाल वंशाची स्थापना करणाऱ्या राजा गोपाळने ह्या विद्यापीठाची स्थापना बौद्ध विहाराच्या रूपात केली होती.याच्या विशाल भवनांना बघून बख्तियार खिलजीला वाटलं की हा एखादा किल्लाच आहे.म्हणून त्याने यावर आक्रमण केलं.वेळेवर सैनिकी मदत मिळू शकली नाही. फक्त विद्यार्थी आणि आचार्यांनीच शर्थीनं झुंज दिली.पण सर्वच्या सर्व मारले गेले.. !


सुलोटगी विद्यापीठ


कर्नाटकातील विजापूर जिल्ह्यातील हे महत्त्वाचे विद्यापीठ.अकराव्या शतकाच्या शेवटी उभे राहिले.राष्ट्रकूटांचे शासन असताना कृष्ण (तृतीय) ह्या राजाचा मंत्री नारायण याने हे विद्यापीठ बांधले.मात्र विद्यापीठ म्हणून काही करून दाखविण्याच्या आतच यावर मुसलमानी आक्रमकांनी कब्जा केला आणि ह्याला उद्ध्वस्त केलं.येथील पविट्टागे हे संस्कृत महाविद्यालय अल्पावधीतच संस्कृत शिक्षणासाठी चर्चित झाले होते.देशभरातली निवडक २०० विद्यार्थ्यांना भोजन-निवासासह शिक्षण देणारे हे विद्यापीठ वैशिष्ट्यपूर्ण होते.


सोमपूर महाविहार


बांगलादेशच्या नवगाव जिल्ह्यात बादलगाझी तालुक्यातील पहाडपूर गावात महाविहार म्हणून स्थापित झालेले हे शिक्षा केंद्र पुढे विद्यापीठ म्हणून नावारूपाला आले.पाल वंशाचा दुसरा राजा धर्मपाल देव ह्याने आठव्या शतकाच्या शेवटी ह्या विहाराचे निर्माणकार्य केले.जगातील सर्वांत मोठे बौद्ध विहार म्हणता येईल अशी याची रचना होती.चीन/ तिब्बत/ मलेशिया / जावा / सुमात्रा येथील विद्यार्थी येथे शिकण्यासाठी येत होते.


दहाव्या शतकातील प्रसिद्ध विद्वान अतीश दीपशंकर श्रीज्ञान हे ह्याच विद्यापीठाचे आचार्य होते.


रत्नागिरी विद्यापीठ,ओडिशा सहाव्या शतकात बौद्ध विहाराच्या रूपात स्थापन झालेले हे स्थान पुढे शिक्षणाचे मोठे केंद्र झाले.तिबेटमधील अनेक विद्यार्थी येथून शिकून गेले.तिबेटीयन इतिहासात या विद्यापीठाचा उल्लेख 'कालचक्र तंत्राचा विकास करणारे विद्यापीठ' असा केलेला आहे.कारण येथे खगोलशास्त्राचा अभ्यास व्हायचा.


अखंड भारताच्या अक्षरशः कानाकोपऱ्यात शिक्षणाची ही केंद्र वसलेली होती.अगदी लहान नाही.लहान विद्या केंद्र तर किती होती त्याची गणतीच नाही.


जबलपूरला,भेडाघाटमधे चौसष्ट योगिनींचे मंदिर आहे. त्याला 'गोलकी मठ' असेही म्हणतात.ह्या 'गोलकी मठ'चा उल्लेख 'मलकापूर पिलर' म्हणून प्रसिद्ध असलेल्या खोदकामातही झालेला आहे.


'मटमायुर वंश' हा कलचुरी वंशांपैकीच एक आहे.या वंशाच्या युवराजदेव (प्रथम) ह्याने ह्या मठाची स्थापना केली.मुळात हे तांत्रिक आणि इतर विषयांचं विद्यापीठ होतं.ह्या गोलकी मठाच्या अर्थात विद्यापीठाच्या आधीन अनेक विद्यालयंही आंध्र प्रदेशात होती.


बंगालमधील 'जगद्द्ल',आंध्र प्रदेशातील 'नागार्जुनकोंडा',

काश्मीरमधील 'शारदापीठ', तामिळनाडूमधील 'कांचीपुरम',ओडिशामधील 'पुष्पगिरी',उत्तर प्रदेशातील 'वाराणसी'... अशी किती नावं घ्यावीत..? ही सारी ज्ञानमंदिरं होती, ज्ञानपीठं होती.अगदी वनवासी अन् (आजच्या भाषेत) मागास भागातही आवश्यक ते शिक्षण सर्वांना मिळत होते.संस्कृत ही फक्त राजभाषाच नव्हती तर ती लोकभाषा होती.पुरुषपूर (पेशावरचे प्राचीन नाव) पासून ते कंबोडिया, लाओस,जावा सुमात्रापर्यंत संस्कृत हीच भाषा चालत होती.इसवी सनापूर्वी शंभर / दोनशे वर्षांपासून ते इसवी सन अकराशेपर्यंत या संपूर्ण भूभागावर संस्कृत ही राजभाषा आणि लोकभाषा म्हणून प्रचलित होती.भारतीय विद्यापीठांची कीर्ती जगभरात पसरली होती. शिक्षणाच्या क्षेत्रात भारत सर्वोच्च स्थानावर होता,आणि म्हणूनच व्यापारातही होता..! -


आज ह्या साऱ्या गोष्टी परीकथेतल्या वाटतात. एक हजार वर्षांच्या मुस्लीम आणि इंग्रजी राजवटीमुळे आपलं समृद्ध असं ज्ञान तर आपण विसरलोच,पण शिक्षणाच्या बाबतीतही पूर्णपणे मागासलो.


शिक्षणाचा आपला समृद्ध वारसा आठवायला आपल्याला पाश्चात्त्य चिंतकांची आणि संशोधकांची मदत लागते,हीच आपली शोकांतिका आहे.


२१ फेब्रुवारी २०२३ या लेखातील पुढील भाग…

२३/२/२३

पुस्तकांसोबत जगताना…

नमस्कार मी विजय गायकवाड राजर्षी शाहू महाराजांच्या करवीर ( कोल्हापूर ) जवळच असलेल्या टोप या गावात मी राहतो.पोट भरण्यासाठी जे काय सर्व संघर्ष करावे लागतात.ते मी करतोच कौटुंबिक जबाबदारी पूर्ण करत असताना माझीही दमछाक होते,वैचारिक संघर्ष,न पटणारे विचार या धावत्या जगात मी ही अस्वस्थ होतो.मेनन पिस्टन रिंग टोप संभापूर या कंपनीमध्ये जनरल कास्टिंग (फौन्ड्री) या ठिकाणी मी काम करत आहे.दिवसभर शारीरिक कष्ट करतो,व सायंकाळी माझ्या घरट्याकडे म्हणजेच घराकडे परत येतो.कंपनी ते घर या सरळ मार्गावरील मी सरळ प्रवास करणारा माणूस.. माझ्याही जीवनात चढउतार हे येतात व जातात. या जगण्यावर या जगण्यावर मी शतदा प्रेम करतो. हा जीवनातला प्रवास करत असताना एक दिवस आयुष्याला वेगळं वळण देणारी घटना घडली. ती मी आयुष्यभर कधीही विसरू शकणार नाही. 


आयुष्यात माझी पुस्तकाशी झालेली सर्वप्रथम भेट तो क्षण माझ्यासाठी जिवंत व अविस्मरणीय होता. स्टीफन हॉकिंग साहेबांनी फार वर्षांपूर्वी सांगून ठेवलेलं होतं की हे सगळं जग आपण फुकट वापरत आहोत या जगाला जर आपल्याला काय परत फुकट द्यायचं असेल तर असं काहीतरी द्या की ज्यामुळे आपल्या मनाला समाधान वाटेल की खरंच आपण काहीतरी या जगाला दिलेलं आहे. कारण अनेकांनी आपल्याला बरचं काही दिलेलं आहे.त्यामुळे आपणही असंच काहीतरी दुसऱ्यांना द्यावं हे ओघाने आलेच.


'तुम्हाला कोणीही बघत नसताना तुम्ही जे असता तेच तुम्ही असता.' हे पुस्तकातील वाक्य मला जगायचं कसं हे सांगून जातं.परिस्थिती बदलल्यानंतर माणसाला बदलण्यास फार वेळ लागतो व त्रासही होतो.पण पुस्तके माझ्या जीवनात अंधकार नष्ट करून सदैव प्रकाशाची योजना करणारा चिरंतन असा प्रकाशाचा ठेवा आहे.वार ( हवा ) जेव्हा आपल्याला अंगाला जाणवत नसतं त्यावेळेला वाऱ्याची दिशा कोणत्या बाजूला आहे हे आपण सहजपणे सांगू शकत नाही,पण त्याचवेळी जर आपण झाडाचा शेंडा पाहिला तर आपल्याला नक्कीच कळतं की वाऱ्याची दिशा कोणती आहे.पुस्तके मला परिस्थिती बदलण्या अगोदर बदलण्याचे बळ देतात.


'ज्या झाडाच्या सावलीत बसण्याचा आपला विचार नसेल.अशी झाड आपण लावली पाहिजेत‌..!' 


हे जिवंतत्व मी पुस्तकातूनच शिकलो आहे.


'पुस्तके ही जमिनीवर असतात पण आकाशाला गवसणी घालण्याचे सामर्थ्य ती आपणास देतात.'


पुस्तक वाचल्यामुळे माझ्यामधील 'संयम' वाढीला लागला आहे.जे जसं आहे तसं ते स्वीकारायचं हे सत्य पुस्तक मला नेहमी सांगतात.शरीराच्या वाढीसाठी,विकासासाठी अन्न हे जसं महत्त्वपूर्ण आहे,त्याचबरोबर माणसाचे जीवन सुलभ होण्यासाठी अन्न,वस्त्र,निवारा ही जशी मूलभूत गरज आहे,तसंच पुस्तक वाचन ही सुद्धा एक मूलभूत गरज आहे असं मला वाटतं. पुस्तकाच्या वाचनामुळे माझं अविकसित जीवन विकसित झालं,विस्तृत झालं व माझं मर्यादित जीवन हे अमर्यादित झालं.मानवी जीवनातील अवघडातील अवघड प्रश्नाची उत्तरे सरळ व सोप्या भाषेमध्ये मला पुस्तकात सापडतात.त्यामुळे मी नेहमीच निवांत व बिनधास्त असतो.कारण पुस्तके माझ्यासोबत असतात.मी दररोज न चुकता वाचन करतो. पुस्तक वाचन करणे आता माझा श्वास बनलेला आहे.


पुस्तक वाचन करणे म्हणजे माझे एक वेळचं जेवण आहे.


कोल्हापूरातील वाचणालयामध्ये सभासद झालो.बरीत पुस्तके वाचलीत.महिण्याकाठी मला पगारापोटी ९ ते १० हजार पगार मिळतो.

त्यातील महिण्याला किमान १ हजार ते पंधराशे रुपयाची पुस्तके विकत घेवून वाचतो. 


'पुस्तक विकत घेणारे आणि वाचणारे लोक कोण असतात.असं तुम्हाला वाटतं ते गरीब नक्कीच नसतात."


कधी कधी पुस्तके वाचायला कमी पडलीत तर आमचे मित्र,मार्गदर्शक मला हवी ती पुस्तके आनंदाने पाठवितात.


त्यामध्ये सुनिल घायाळ,माधव गव्हाणे,विष्णु गाडेकर पाटील,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सुधीर सरवदे, विनायक पाटील,शितल खाडे,विश्वास खाडे,तात्या गाडेकर.सतिश खाडे,दादासाहेब ताजणे,राजेश कान्हेकर,संतोष पांचाळ,

सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,

निखिल इंगळकर व इतर मित्रमंडळी आवर्जुन पुस्तके पाठवतात.त्याच्या ऋणात कायम राहणे मला मनापासून आवडते.


चांगले वाचणे म्हणजे खरी पुस्तके खऱ्या 

भावबळाने वाचणे.ग्रंथ ज्या हेतुपुरस्सरतेने

आणि संयमानेलिहिले जातात,तितक्याच हेतुपुरस्सरतेनेआणि संयमाने ते वाचले गेले पाहिजेत.हेन्री डेव्हिड थोरोने सांगितलेला नियम मी न मोडता पाळतो.त्यामुळे पुस्तके मला 'आपला' म्हणतात.माझ्याकडे सध्या १४८ पुस्तके आहेत.ती ४०७१५ रुपयाची आहेत.


स्वतःच स्वतःसाठी असणे,फार फार महत्त्वाचे आहे.मी जर स्वतःसाठीच नसेन,तर माझ्यासाठी कोण असणार आहे ? " हिलील यांच हे जीवनतत्व मला पुस्तकांनीच शिकवले आहे.


इगो इज द् एनिमी - रॉयन हॉलीडे, इमोशनल इंटेलिजन्स - डॅनियल गोलमन,जग बदलणारे ग्रंथ - दीपा देशमुख,ह्युमनकाइंड - रूट्बर्ग ब्रेगमन,कुरल - सानेगुरुजी,सजीव - अच्युत गोडबोले,दगड - धोंडे-नंदा खरे,वारूळ पुराण-नंदा खरे,द सीक्रेट-रॉन्डा बर्न,चकवा चांदणं मारुती चितमपल्ली,द सेकंड सेक्स-सिमोन द बोव्हुआर,इसेंशियलिझम-ग्रेग मँकेआँन, आर्टिफिशिअल इंटेलिजन्स-अच्युत गोडबोले,पाश्चात्य राजकीय विचारवंत,

शरीर,गन्स,जर्म्स अँड स्टील-जेरेड डायमंड,द पावर ऑफ पर्सिस्टन्स-जस्टीन सँच,द आर्ट ऑफ रिसायलेन्स-गौरांगदास,द गॉड डेल्युजन - रिचर्ड डॉकिन्स,सर्वोत्तम देणगी-जिम स्टोव्हँल,थिंक लाईक अ विनर-डॉ.वॉल्टर डॉयले स्टेपलस् अशाच अनुषंगाने मी पुस्तक वाचीत आहे.व शेवटपर्यंत वाचीत राहीन.


१९९६ साली मी शाळा सोडली.(मी ९ पास आहे.)अजूनही मला शाळेने सोडलेलं नाही. कोणत्या ना कोणत्या स्वरूपात मी शाळेशी व शाळा माझ्याशी जोडलेले आहोत. पुस्तकांनी मला जोडून ठेवलेले आहे. 


तुमच्या वेदनेची दुःखाची जर तुम्हाला जाणीव होत असेल तर तुम्ही माणूस आहात तशीच दुसऱ्याच्या वेदनेची दुःखाची तुम्हाला जाणीव होत असेल तर तुम्ही जिवंत आहात. ही भावना संवेदना मला पुस्तकांनी दिली आहे.


जग बदलणारे ग्रंथ - दीपा देशमुख मनोविकास प्रकाशन या ग्रंथामध्ये पुस्तकांविषयी अनेक महत्त्वपूर्ण नोंदी केलेल्या आहेत.


'तुम्हाला जर संधी मिळाली तर तुम्ही तुमची मुलं जाळून टाकाल,की तुमची पुस्तकं ?'असा विचित्र प्रश्न स्किनरनं त्याच्या पहिल्याच टेलिव्हिजनच्या कार्यक्रमात प्रेक्षकांना थेटपणे विचारला होता आणि इतकंच नाही,तर 'मी तर मुलांनाच जाळेन,कारण मानवी प्रगतीमध्ये माझ्या पुस्तकांमुळे माझ्या जीन्सपेक्षा जास्त योगदान मिळेल,'असंही त्या प्रश्नांचं स्वत:च सरळपणे उत्तरही दिलं होतं! अर्थातच त्याच्या या विधानावर प्रचंड गदारोळ झाला; बऱ्याच उलटसुलट चर्चाही झाल्या; 


अलेक्झांडरचं स्वप्न तुर्कस्थानचा खलिफा उमर याच्यामुळे उद्ध्वस्त झालं असलं, तरी २००२ साली तिथल्या सरकारने त्याचं स्वप्न पूर्णत्वाला न्यायचं ठरवलं आणि पुन्हा बिब्लिओथेका अलेक्झांड्रिया या नावाचं एक मोठं ग्रंथालय उभं केलं.हे ग्रंथालय अतिशय भव्य असं असून एकूण १० लाखांवर पुस्तकं,सव्वा दोन लाख चौरस फुटांचा वाचन कक्ष,३ सभागृह, १ तारांगण,४ संग्रहालयं,४ कलादालनं,उपाहारगृहं, प्रदर्शनं आणि वेगवेगळ्या विषयांनुसार केलेले वेगवेगळे पुस्तकांसाठीचे असंख्य कक्ष असा अवाढव्य पसारा या ग्रंथालयात आहे.या ग्रंथालयात जाताना बरोबर गाईड घेऊन जाणं आवश्यक असून आत जाण्यासाठी प्रवेश तिकीट खरेदी करावं लागतं.अरेबिक, फ्रेंच आणि इंग्रजी या भाषेतली पुस्तकं जास्त प्रमाणात असून शिवाय जगातलं कुठल्याही देशातलं कुठलंही पुस्तक इथे तुम्हाला मिळण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात आहे. एकाच वेळी २ हजार वाचक बसून निवांत वाचन करू शकतील अशी

सुरेख रचना या ग्रंथालयात केली आहे.एखाद्या पंचतारांकित हॉटेलमध्ये गेल्याचा सुखद अनुभव या ग्रंथालयात गेल्यावर मिळतो.पुरातन काळात जिथे अलेक्झांड्रिया विद्यापीठ होतं,त्याच जागेवर हे ग्रंथालय उभारण्यात आलं आहे. या ग्रंथालयाच्या उभारणीत इजिप्शियन सरकार, फ्रेंच सरकार आणि युनेस्कोनेही आर्थिक मदत केली आहे.या सगळ्यांच्या मदतीने भव्य असं 'बिब्लिओथेका अलेक्झांड्रिया' हे ग्रंथालय आज दिमाखात उभं आहे.या ग्रंथालयात ८० लाख पुस्तकं ठेवण्याची सोय करून ठेवलेली आहे. १९४ देशांमधली पुस्तकं इथे बघायला मिळतात. त्या ग्रंथालयात पंडित जवाहरलाल नेहरू आणि महात्मा गांधी यांचीही पुस्तकं उपलब्ध आहेत. या ग्रंथालयाचं संगणकीकरण झालं असून इथे डिजिटल लायब्ररीचा विभाग देखील आहे. समजा,एखादं दुर्मिळ पुस्तक आपल्याला हवं असेल,तर अवघ्या पाच मिनिटांत तिथे असलेल्या प्रिंटरवरून ते हवं असलेलं पुस्तक मूळ पुस्तकासारखंच छापून त्या वाचकाला दिलं जातं हे विशेष!


"बिब्लिओथेका अलेक्झांड्रिया' या ग्रंथालयात अंध व्यक्तींसाठी स्वतंत्र विभाग असून हजारो पुस्तकं ब्रेल लिपीत उपलब्ध आहेत. ऑडिओ स्वरूपातली पुस्तकं वाचण्यासाठी खास विभाग आणि बसायला आरामदायी खुर्च्या,हेडफोन्स अशी व्यवस्था वाचकासाठी केलेली आहे.एकदा वाचक ग्रंथालयात गेला,की तो सायंकाळच्या पाच वाजेपर्यंत कितीही वेळ आतमध्ये व्यतीत करू शकतो.या ग्रंथालयाची संपूर्ण इमारत वातानुकूलित असून वाचकाला टिपण काढण्यासाठी वही आणि पेन मोफत उपलब्ध

केले जातात.संगणकावर हव्या असलेल्या पुस्तकाची माहिती टाकताच,तिथले स्वयंसेवक हवी तेवढी पुस्तकं वाचकाला त्याच्या टेबलवर आणून देतात.'बिब्लिओथेका अलेक्झांड्रिया' सारखी ग्रंथालयं संपूर्ण जगभर निर्माण झाली, तर खरंच काय बहार होईल ?


ग्रंथालयांची जशी उभारणी झाली पाहिजे,तसंच प्रत्येक ग्रंथाची बांधणी चांगली,उत्तम दर्जाची होणं आवश्यक असतं.नाही तर पानं निखळतात आणि ग्रंथ नष्ट होतो.आजच्या भाषेत पुस्तकाचं बाइंडिंग नीट आणि पक्कं असायला हवं.पूर्वी कापडामध्ये घट्ट गुंडाळून ग्रंथ व्यवस्थित ठेवत. ते इतके घट्ट बांधलेले असत की,पाण्यात पडले तरी आतला कागद भिजत नसे.ग्रंथांच्या पानांना कसर लागू नये म्हणून त्यात सापाची कातण किंवा लिंबाची पाने ठेवत.म्हणून प्राचीन ग्रंथ हजारो वर्षे टिकले.थायलंडची राजधानी असलेलं बँकॉक हे शहर जगभरातल्या पर्यटकांसाठी आकर्षणाचं केंद्र आहे. मात्र या शहराचं वैशिष्ट्य असं की,या शहरात मोजकीच पण पुस्तकांची इतकी भव्यं दुकानं आहेत,की इथे भेट देणारा पुस्तकप्रेमी चकित होतो.इथे उपलब्ध असलेल्या पुस्तकांची मांडणी आणि सजावट इतक्या आकर्षक पद्धतीने केलेली आहे,की वाचकाला पुस्तका विकत घेण्याचा मोह व्हावा.पुस्तक शोधताना प्रत्येक पुस्तकाला खालून स्प्रिंग लावलेल असल्यामुळे तिथलं बटण दाबताच हवं ते पुस्तक समोर येतं.त्या पुस्तकाला अनेक वाचकांनी हाताळू नये,त्याचं नवेपण अबाधित राहावं यासाठी ती व्यवस्था केली असून वाचक पुस्तक विकत घेण्यासाठी प्रवृत्त कसा होईल याची काळजी इथल्या दुकानांनी खूप कल्पकतेनं घेतली आहे.ही नाविन्यपूर्ण माहिती ऐकून मी थक्क झालो.


ज्या कुणाचं आयुष्य अतिशय साधं आहे,त्यांना समाधान नक्कीच मिळतं.आनंद मिळण्यासाठी आणि आनंद मिळवण्यासाठीही साधेपणा 

अत्यंतिक महत्वाचा आहे. हे दलाई लामा यांचे वाक्य जगण्याला उर्मी देऊन जातं. 


कारण आपण सर्वजण सुखी व समाधानी राहू शकतो.या धकाधकीच्या व धावत्या जगामध्ये,

आयुष्यामध्ये एवढाच एक शांततेचा विरंगुळा असेल तो ही स्वतःसाठी..


शेवटी जाता जाता..


प्रख्यात कवी गुलजार यांच्या एका सुरेख कवितेचा अनुवाद विजय पाडळकर यांनी केला, त्यात पुस्तकाशी हितगुज करताना गुलजार म्हणतात :


मित्राशिवाय सारा दिवस कसाबसा ढकलला स्वतःशीच अनोळखी असा

एकाकी,उदास

समुद्रकिनाऱ्यावर दिवस विझवून

 मी परत इथेच आलो

निर्मनुष्य रस्त्यावरील रिकाम्या घरात

दरवाजा उघडताच

टेबलावर ठेवलेलं पुस्तक 

हलकेच पान फडफडवीत म्हणालं 

उशीर केलास,मित्रा!


"दररोज मी पुस्तके वाचतो.. 

आणि स्वतःला' च शिकवतो."

पुस्तकातील हे वाक्य मला बरचं काही शिकवून जातं.


"सर्वियन कादंबरीकार मिलोराद" यांचे एक वाक्य आहे ते म्हणतात" 


जोवर जगात पुस्तक वाचणाऱ्या वाचकांची संख्या बंदूकधारी सैनिका पेक्षा अधिक आहे तोवर काळजीच काहीच कारण नाही" 


पुस्तकांचे,लेखकांचे,प्रकाशकांचे पुस्तकासोबत जोडले गेलेल्या सर्वांचे मनःपूर्वक आभार व धन्यवाद..


हा लेख मासिक 'शिक्षण यात्री' मध्ये जानेवारी - फेब्रुवारी या जोड अंकामध्ये प्रकाशित केल्याबद्दल संपादकिय मंडळ व ह्या अंकांच्या निर्मितीमध्ये समाविष्ट असणाऱ्या सर्वांचे मनापासून आभार..


विजय कृष्णात गायकवाड


२१/२/२३

आपले प्राचीन 'संपन्न' रसायनशास्त्र..

पाऱ्याचा शोध नेमका कोणी लावला? ह्या प्रश्नावर निश्चित असे उत्तर कोणीच देत नाही. पाश्चात्त्य जगाला तर अगदी सतराव्या शतकापर्यंत पाऱ्याची नीट ओळख नव्हती. इजिप्तमधल्या पिरामिडमधे इसवी सनाच्या १८०० वर्षांपूर्वीचा पारा ठेवलेला आढळला. पारा विषारी असतो याबाबत सर्वांचेच एकमत आहे.म्हणूनच १४० पेक्षा जास्त देशांनी पाऱ्याचा समावेश असलेल्या भारतीय आयुर्वेदिक औषधींवर तीन वर्षांपूर्वी प्रतिबंध लावला होता,जो नंतर उठवला गेला.


मात्र गंमत म्हणजे हा विषारी समजला जाणारा पारा,इसवी सनाच्या दोन/अडीच हजार वर्षांच्या आधी,वेगवेगळ्या क्षेत्रांत भारताद्वारे वापरला जात होता.इसवी सनाच्या पाचशे वर्षांपूर्वीपासून तर हा आयुर्वेदात वापरला जातोय.अगदी पोटात घेण्याच्या औषधांमध्ये..! आता,पाश्चात्त्य जग ज्याबद्दल तीनशे वर्षांपूर्वीपर्यंत पूर्णपणे अनभिज्ञ होतं,अशा विषारी पाऱ्याचा उपयोग साधारण अडीच हजार वर्षांपूर्वीपासून आपण औषध म्हणून करतोय,हेच मुळात आश्चर्य आहे.

आणि अशा प्रकारे पाऱ्याचा उपयोग करताना त्याची पूर्ण 'प्रोसेसिंग' करून तो वापरला जायचा हे महत्त्वाचं.


आपल्या संस्कृतीत ज्याप्रमाणे जन्मापासून मृत्यूपर्यंत मनुष्यावर सोळा संस्कार केले जातात, त्याप्रमाणे पाऱ्यावर अठरा प्रकारचे संस्कार करून मगच तो औषधाद्वारे सेवन करण्यायोग्य होतो. हे १८ संस्कार आहेत -


१.स्वेदन, २.मर्दन,३.मूर्च्छन,४.उत्थापन,

५.पातन,६.रोधन,७.नियामन,८.संदीपन,

९.गगनभक्षणमान,१०.संचारण,११.गर्भदृती,

१२.बाह्यदृती,१३.जारण,१४.ग्रास,१५.सारण,

१६.संक्रामण,१८.शरीरयोग


वाग्भटाचार्यांनी लिहिलेल्या 'रस रत्नसमुच्चय' या ग्रंथात पाऱ्याच्या औषधी उपयोगाबद्दल बरीच सविस्तर माहिती दिलेली आहे.हा ग्रंथ साधारणपणे सन १३०० च्या आसपास लिहिला गेलेला आहे.यातील माहिती ही,संकलित आहे.अर्थात जे ज्ञान आधीपासूनच माहीत आहे, त्याला हे तेराव्या/ चौदाव्या शतकातले वाग्भटाचार्य शब्दांकित करून,सविस्तर समजावून आपल्यापुढे (हे वाग्भट वेगळे आणि 'अष्टांग हृदय' हा आयुर्वेदाचा परिपूर्ण ग्रंथ, पाचव्या शतकात लिहिणारे वाग्भट वेगळे.)


वेगळ्या प्रक्रियांचे विधी सविस्तर दिलेले आहेत. अर्थात किमान दोन अडीच हजार वर्षांपूर्वीपासून आपल्या भारतीयांना हे 'रसायन शास्त्र' फार चांगल्याप्रकारे माहीत होतं आणि आपल्या पूर्वजांनी त्याचा अत्यंत पद्धतशीरपणे विकास केलेला होता.


'रस रत्नसमुच्चयात'दिलेल्या माहितीनुसार दोला यंत्र,पातना यंत्र,स्वेदनी अधः-पालन यंत्र,यंत्र,जारणा यंत्र,विद्याधर (ऊर्ध्वपातन) यंत्र,सामानत यंत्र,बालुका यंत्र,लवण यंत्र,हंसपाकयंत्र,भूधर यंत्र,कोष्टी वलभी यंत्र,तिर्यकपातन यंत्र,पालिका यंत्र,नाभी यंत्र,इष्टीका यंत्र,धूप यंत्र,स्वेदन (कंदुक) यंत्र,तत्पखल यंत्र... अशा अनेक यंत्रांचा उपयोग 'रसशाळेत' केला जायचा.या यंत्रांद्वारे पारद (पारा),गंधक इत्यादींवर रासायनिक प्रक्रिया करून औषधं तयार केली जायची.


नागार्जुनाने 'रस रत्नाकर' या ग्रंथात सिनाबार या खनिजापासून पारद (पारा) मिळविण्याच्या आसवन विधीचा विस्ताराने उल्लेख केला आहे. असाच विधी 'रस रत्नसमुच्चय' आणि पुढे चरक / सुश्रुत यांच्या संहितेतही आढळतो.यात आसवन प्रक्रियेसाठी ढेकी यंत्राचा उपयोग सांगितलेला आहे.गंमत म्हणजे ज्या आधुनिक पद्धतीने पारा प्राप्त केला जातो,तो विधी,ह्या ग्रंथात दिलेल्या विधीसारखाच,फक्त आधुनिक साधनांनी केलेला,आहे...!


हे फार महत्त्वाचं आहे.ख्रिस्तपूर्व पाचशे / सहाशे वर्षांपूर्वी आपल्या पूर्वजांनी अत्यंत व्यवस्थित, well defined, systematic अशा अनेक रासायनिक प्रक्रिया वापरायला सुरुवात केली होती,ज्यांचं मानकीकरण (standardization) त्याच काळात झालेलं होतं.


आचार्य सर प्रफुलचंद्र रे (सन १८६१ ते १९४४) यांना आधुनिक काळातील आद्य रसायनशास्त्रज्ञ म्हटले जाते.

यांनीच भारताची पहिली औषधं निर्माण करणारी कंपनी,'बेंगाल केमिकल्स अँड फार्मेस्युटीकल्स'स्थापन केली.इंग्रजांच्या वरिष्ठ वर्तुळातही यांना बराच सन्मान होता. ह्या प्रफुलचंद्र रे ह्यांनी एक सुरेख पुस्तक लिहिलंय -


'हिंदू केमिस्ट्री' नावाचं. या पुस्तकात त्यांनी ठामपणे हे मांडलंय की,रसायनशास्त्राच्या निर्मितीत आपले हिंदू पूर्वज कितीतरी पुढे होते. या पुस्तकात त्यांनी वेदांमधे असलेला वेगवेगळ्या रसायनांचा उल्लेख,अणू / परमाणूंच असलेलं विस्तृत विवेचन,चरक आणि सुश्रुत यांनी रसायनांवर केलेले विस्तृत प्रयोग यांबद्दल विस्तारानं लिहिलं आहे.अगदी त्या काळात असलेल्या केस रंगवण्याच्या कलेपासून ते पाऱ्यावर केलेल्या वेगवेगळ्या प्रयोगांपर्यंतचे अनेक संदर्भ या पुस्तकात येतात. धातुशास्त्राबद्दलसुद्धा या पुस्तकात त्यांनी लिहिल आहे.१९०४ मध्ये लिहिलेल्या ह्या पुस्तकाने इंग्रज संशोधकांचा आयुर्वेद आणि आपल्या प्राचीन रसायनशास्त्राकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला.


आपल्या वेदामध्ये रसायनशास्त्रासंबंधी अनेक उल्लेख येतात.आयुर्वेदात अश्मन,मृत्तिका (माती),सिकता (वाळू),अयस (लोखंड किंवा कांसे),श्याम (तांबे),सीस (शिसे) यांच्या मदतीने केलेल्या प्रयोगांची उदाहरणं आहेत.


तैत्तिरीय संहितेचा भाष्यकार,'सायण' याने श्यामचा अर्थ काळे लोखंड असा केला आहे. यजुर्वेदात एका मंत्रात अस्ताप (Iron Smelter) चा उल्लेख आहे.लोखंडाच्या खनिजाला लाकूड / कोळशाने तापवून कशा प्रकारे लोखंड हा धातू तयार केला जातो याचे वर्णन यात केलेले आहे. अथर्ववेदात शिसे या धातूवर 'दधत्यम सीसम..' नावाचे पूर्ण सूक्त आहे.शिशाचे बनवलेले छर्रे युद्धात वापरायचे असा अर्थ यातून ध्वनित होतो...


प्राचीन काळातील यज्ञशाळा ह्याच या देशातील मूळ रसायनशाळा होत्या.


तैत्तिरीय संहितेत यज्ञशाळेत/ रसायनशाळेत लागणाऱ्या उपकरणांची सूचीच दिलेली आहे

इष्य - इंधन

बर्ही - फुंकणी किंवा स्ट्रॉ

वेदि / घिष्ण्य - अग्नी निर्माण करण्याच्या जागा,ज्यातून रासायनिक प्रक्रियांसाठी लागणाऱ्या भट्ट्या निर्माण झाल्या.

स्त्रुक - चमचे

चमस - प्याले / भांडी

ग्रावस - खल-बत्ता मधील बत्ता

द्रोणकलश - रसायने ठेवण्याचे लाकडी पात्र 

आघवनीय - रसायनांचे मिश्रण करण्याचे पात्र

ही यादी बरीच लांबलचक आहे.पण याचा अर्थ स्पष्ट आहे.त्या वैदिक काळात,शास्त्रशुद्धरीत्या तयार केलेल्या रसायनशाळा होत्या.तेथे कोणकोणत्या वस्तू / पात्रं असावीत हे निश्चित होतं.आणि करण्यात येणाऱ्या प्रक्रिया सुद्धा निश्चित आणि ठरलेल्या होत्या.


शतपथ ब्राम्हण,ऋग्वेद,यजुर्वेद,अथर्ववेद इत्यादी ग्रंथांत ठिकठिकाणी रसायनं आणि त्यांचे विविध क्षेत्रांत होणारे उपयोग यासंबंधी विवेचन आढळते.


या काळात जगाच्या इतर भागात, रसायनशास्त्रासंबंधी असे सुस्पष्ट,व्यवस्थित आणि प्रक्रियेसहित केलेले विवेचन आढळते का..? उत्तर नकारार्थी आहे.इजिप्तमधे काही मोजके उल्लेख आढळतात आणि चीनमधे चीनने अनेक रसायनांवर त्या काळात काम केल्याचे दिसते.मात्र हे सोडलं तर जगात इतरत्र कोठेही रसायनशास्त्र इतक्या प्रगत अवस्थेत आढळत नाही.


अकराव्या शतकातील चक्रपाणी दत्तने 'चक्रदत्त' नावाचा ग्रंथ लिहिलाय.जुन्या माहितीला शब्दबद्ध करून तो सुसूत्रपणे आपल्यासमोर ठेवतो.यात त्याने ताम्ररसायन बनविण्याचा विधी दिलेला आहे.पारा,तांबे आणि अभ्रकावर प्रक्रिया करून त्याला गंधकाचा पूट देऊन ताम्ररसायन कसे तयार करतात,हे त्याने समजावून सांगितले आहे.याच पद्धतीने 'शिलाजतुरसायन' चे विवरण आहे.


चक्रपाणीच्या दोनशे वर्षांनंतर शारंगधराचार्य यांनी लिहिलेल्या 'शारंगधर संहिते'मधे अनेक रसायन प्रक्रियांबद्दल उल्लेख आहेत. मात्र यात सुरुवातीलाच लिहिले आहे की,जुन्या ऋषी-मुनींनी आपापल्या संहितांमध्ये जे श्लोक दिलेले आहेत,आणि अनेक चिकित्सकांनी ज्यापासून यश मिळवले आहे.अशा श्लोकांचे हे संकलन आहे.या संहितेत आसव,काढे बनवताना रासायनिक प्रक्रिया अत्यंत विस्तृतपणे दिलेल्या आहेत.


या किंवा अशा अनेक ग्रंथांमध्ये कणादच्या अणू / परमाणू सिद्धांताचा उल्लेख केलेला आढळतो.कणादने सांगितले आहे की,


 एका प्रकारचे दोन परमाणू संयुक्त होऊन 'द्विणूक' निर्माण होऊ शकते.द्विणूक म्हणजेच आजच्या शास्त्रज्ञांनी परिभाषित केलेला 'बायनरी मॉलीक्युल' वाटतो.


प्राचीन भारतात रासायनिक प्रक्रियांसंबंधी बरीच माहिती होती.याच पुस्तकातील 'अदृश्य शाईचे रहस्य' या लेखात,पाण्यात भूर्जपत्र टाकल्यावर दिसू शकणाऱ्या शाईचे वर्णन केले होते.अशा प्रकारची शाई तयार करताना अनेक प्रयोग, अनेक रासायनिक प्रक्रिया त्या काळात केल्या असतील.वातावरणातील आर्द्रता,प्राणवायू, अनेक आम्लीय / क्षारीय पदार्थांबरोबर धातूंचा संपर्क झाल्यावर होणाऱ्या प्रक्रिया... यातून धातूंच्या संरक्षणाचे उपाय.. या साऱ्या गोष्टी तेव्हा माहीत होत्या.'याज्ञवल्क्य स्मृती' मध्ये धातूंना शुद्ध करण्याची प्रक्रिया दिली आहे. 'रसार्णव' मधे सांगितलं आहे की,शिसे,लोखंड, तांबे,चांदी आणि सोने ह्या धातूंमध्ये स्वसंरक्षणाची प्रवृत्ती ह्याच क्रमात कमी होत जाते,जी आजच्या आधुनिक रसायनशास्त्राप्रमाणे बरोबर आहे.


हे खरं आहे की,आजच्या रसायनशास्त्राने अफाट प्रगती केलेली आहे. 


मात्र आजपासून दोन / अडीच हजार वर्षांपूर्वी रसायनशास्त्राचे मूलभूत सिद्धांत मांडत,अत्यंत व्यवस्थित,परिपूर्ण अशी डॉक्युमेंटेड सिस्टम भारतामधे कार्यरत होती,ज्यांद्वारे अनेक क्षेत्रांत रासायनिक प्रक्रियांद्वारे कार्य होत होते.औषधी शास्त्र,खनिज शास्त्र,धातुशास्त्र यांसारखी अनेक क्षेत्रं होती,ज्यात रासायनिक प्रक्रिया आवश्यक होत्या.मात्र महत्त्वाचे म्हणजे ही सर्व रसायने, जैविक स्रोतांपासून प्राप्त केली जात होती. संपूर्ण नैसर्गिक पद्धतीने ह्या प्रक्रिया चालत होत्या.


आणि हे सर्व करत असताना आपल्या पूर्वजांनी इतकी मोठी विरासत आपल्यासाठी मागे ठेवली आहे,की त्यातील अनेक प्रक्रियांचा नीट अर्थ लावणंच आपल्याला शक्य झालेलं नाही. अर्थातच प्राचीन रसायनशास्त्राच्या अभ्यासाची आज नितांत निकड आणि गरज आहे...!!


१५ फेब्रुवारी २०२३ या लेखातील पुढील भाग..

१९/२/२३

अमेरिका न शोधणारा कोलंबस…!

१४४२ च्या जुलै महिन्यात ज्यू स्पेनमधून हाकलले गेले.त्याच वर्षांच्या ऑक्टोबर महिन्यात कोलंबसने अमेरिका शोधून काढली;पण शोधून काढली असे म्हणण्याऐवजी त्याने पुन्हा शोधून काढली असे म्हणणे अधिक सोयीचे होईल. 


कारण पाचशे वर्षांपूर्वीच अमेरिका लीफ एरिक्सन याने शोधून काढली होती.तो मोठा धाडसी दर्यावर्दी होता. (Viking Captain होता.) ज्याला आज आपण 'नोव्हास्कोशिया' म्हणतो,त्याच्या किनाऱ्यावर त्याचे गलबत वादळाने जाऊन लागले होते.त्या देशात खूप द्राक्षे आढळल्यामुळे त्याने त्याला 'व्हाईनलँड' असे नाव दिले.


तो तिथे सर्व हिवाळाभर राहिला.परत घरी आल्यावर त्याने आईसलँडमधील काही पिल्प्रिम फादरांना अमेरिकेत जाण्यास आग्रहाने सांगितले. इ.स. १००३ मधील ही गोष्ट.ही वसाहत वसविली गेली;पण तेथील इंडियन लोकांच्या वैरभावामुळे ती मोडली.आणि हे भटके यात्रेकरू पुन्हा स्वदेशी परत आले.


 नॉर्समन लोकांच्या प्राचीन बखरीतून लीफ एरिक्सन व हे दर्यावर्दी लोक यांचे हे पराक्रम वर्णिले आहेत...


तरुणपणी कोलंबस आइसलंडमध्ये गेला होता.पेरू देशाचे प्रोफेसर लुई उल्लेआ म्हणतात की, "कोलंबस त्या वेळी ग्रीनलँडपर्यंत गेला होता.अमेरिकेच्या जमिनीवरही त्याने त्यावेळी पाय ठेवले असावेत.या त्याच्या जलपर्यटनाचा उद्देशच केवळ चाचेगिरी हा होता.प्रोफ़ेसरसाहेबांचा हा अंदाज बरोबर असेल तर कोलंबसाची १४९२ मधील ती सुप्रसिद्ध अमेरिकन सफर पहिली नसून दुसरी असली पाहिजे."


पण हा सारा तर्क आहे.कारण का कोणास माहीत,पण कोलंबस स्वत:च्या पूर्वचरित्राविषयी फारसे कधी सांगत नसे.म्हणून त्याच्या पूर्वचरित्रातील रिकामे भाग भरून काढण्यासाठी अनेक दंतकथा निर्मिल्या गेल्या.

इतिहासकारांनी कोलंबसविषयी लिहिलेले सर्व जर आपण खरे मानू लागलो,तर निरनिराळ्या प्रकारचे शंभर तरी परस्परविरोधी कोलंबस आपणास पाहावे लागतील! त्याचा जन्म अनेक शहरी करावा लागेल,त्याला ज्यू,स्पॅनियर्ड,इटालियन म्हणावे लागेल;कधी त्याला विद्वान म्हणावे लागेल,तर काहीच्या मतानुसार त्याला अगदी 'ढ' म्हणावे लागेल;कोणी म्हणतात की,तो 'सरदारपुत्र होता, तर कोणी म्हणतात,तो एका खानावळवाल्याचा मुलगा होता.कोणी त्याला 'ध्येयवादी' मानतात, तर कोणी त्याला दांभिक ' म्हणतात.कोणी त्याला कविहृदयाचा 'गूढवादी' म्हणतात,तर कोणी त्याला भावनाशून्य धंदेवाला समजतात. कोणी त्याला 'देशभक्त' म्हणतात,तर कोणी त्याला 'देशद्रोही' म्हणतात;कोणी तो अत्यंत दारिद्रयात मेला असे म्हणतात,तर कोणी म्हणतात की,मरणकाली तो संपत्तीत लोळत होता ! कोणी त्याला उत्कृष्ट व कुशल नावाडी म्हणतात,तर कोणी म्हणतात की,त्याला नौकानयनविद्येचा गंधही नव्हता !.


स्वतःच्या आयुष्याच्या ज्या भागाविषयी कोलंबस मौन पाळतो,तो भाग आपणही सोडून देऊ या. अज्ञात भूतकालाच्या धुक्यातून पुढे आलेला असा तो आपणास कुठे बरे दिसतो ? पोर्तुगाल देशाचा राजा दुसरा जॉन याच्याकडे तो गेला असता अटलांटिक महासागरामधून एक मोठी सफर योजावी व तिचा प्रमुख म्हणून आपणास नेमावे,असे तो राजास सांगत होता.राजाचे मन तो असा सफरीसाठी वळवीत होता.


त्या काळात पोर्तुगीज लोक दर्यावर्दी म्हणून जगप्रसिद्ध होते.व्हेनिसचे तसेच जिनोआचे व्यापारी जवळच्या भूमध्यसमुद्रात व्यापार करीत असता पोर्तुगीज लोक अज्ञात व अगाध अशा अटलांटिक महासागरात धाडसाने शिरत होते! आफ्रिकेच्या पश्चिम किनाऱ्याने तसेच दूर मदिरा व कॅनरी बेटांपर्यंत ते जात.


काही धाडसी पोर्तुगीज दक्षिण आफ्रिकेस वळसा घालून हिंदुस्थानला पोहोचू पाहत होते. १४९३ मध्ये तुर्कांनी कॉन्स्टॅटिनोपल घेऊन युरोपचा आशियातील अतिपूर्वेकडील देशांजवळचा खुष्कीचा मार्ग तोडून टाकल्यामुळे युरोपियन व्यापाऱ्यांना जलमार्ग शोधून काढणे भाग झाले.


आणि या सुमारास तो अज्ञात साहसी ख्रिस्तोफर कोलंबस पुढे आला व म्हणाला,"नीट पश्चिमेकडे जाऊन मी पूर्वकडचा रस्ता शोधून काढतो.पृथ्वी वाटोळी आहे आणि ज्यांच्याविषयी आपण इतके ऐकतो ते पूर्वेकडचे राजे आपल्या पायाखाली पाताळात आहेत.मला जर माणसे व गलबते मिळतील,तर मार्को पोलोने स्वप्नातसुद्धा कधी पाहिली नसेल इतकी संपत्ती मी पोर्तुगालमध्ये आणीन आणि पैशाहूनही अधिक महत्त्वाची किंवा निदान तितक्याच महत्त्वाची दुसरी गोष्ट म्हणजे मी साऱ्या हिंदूंना पोर्तुगीज राजाच्या नावाने ख्रिश्चन करीन."


हे ऐकून जॉन राजाच्या तोंडाला पाणी सुटले. कारण स्वार्थ व धर्मप्रसार या दोन्ही गोष्टी साधणार होत्या.पृथ्वी वाटोळी आहे ही गोष्ट काही कोलंबसानेच प्रथम नाही सांगितली.

ख्रिस्त पूर्व.चौथ्या शतकातला ॲरिस्टॉटल म्हणतो, 


"पृथ्वी वाटोळी आहे असे पूर्वीपासून बरेचजण म्हणत आले आहेत."

ॲरिस्टॉटलच्याही काळी ही गोष्ट - हा शोध - जुनाच होता. 


मध्ययुगात या बाबतीत मोठमोठे पंडित वाद करीत असत.जॉन राजाच्या दरबारात येण्यापूर्वी कोलंबसानेही ही गोष्ट पुष्कळदा चर्चेत ऐकली असेल.जॉन राजाने इटलीतील प्रसिद्ध ज्योतिर्विद टॉस्क्नेली याला पत्र लिहून 'युरोप व हिंदुस्थान यांच्यातला सर्वांत जवळचा रस्ता कोणता?'असे विचारले होते,ही गोष्ट तर प्रसिद्धच आहे.टॉस्क्लेलीने उत्तर दिले,"पृथ्वी नि:संशय वाटोळी आहे.अर्थातच अटलांटिक ओलांडून पश्चिमेकडे जाता जाताच हिंदुस्थानचा रस्ता सापडेल." तो पुढे म्हणतो; "पण या देशांना मी पश्चिमेकडे म्हणतो,याचे आश्चर्य वाटू देऊ नये. कारण,जे समुद्रमार्गाने सारखे पश्चिमेकडे जात राहतील,त्यांना हे प्रदेश साहजिकच पृथ्वीच्या दुसऱ्या बाजूला आढळतील."


टॉस्क्नेलीचे हे निश्चित मत कळल्यावर जॉनने कोलंबसास न समजू देता आधीच एक तुकडी पाठवून देण्याचा प्रयत्न केला.कारण,कोलंबस पोर्तुगीज नव्हता व एका विदेशी माणसाकडे या टोळीचे प्रमुखत्व जावे ही गोष्ट जॉन राजास नको होती.पण जॉन राजाने पाठविलेल्या तुकडीतील खलाशांनी बंड केले,त्यामुळे त्या तुकडीच्या कप्तानाला परत यावे लागले.


जॉन राजाचा हा लपंडाव पाहून कोलंबस चिडला,विटला व स्पेनच्या राजाकडे गेला.या वेळेस स्पेनच्या गादीवर फर्डिनंडइझँबेला ही होती.ती कोलंबसाच्या म्हणण्याकडे लक्ष देईनात.त्यांचे लक्ष मुसलमानांबरोबरच्या लढायांत होते.ज्यूविरुद्ध चाललेल्या दुष्ट कारवायांत ती मग्न होती.त्यामुळे कोलंबसच्या म्हणण्याकडे लक्ष देण्यास त्यांचे मन तयार नव्हते.

कोलंबसाने निराश होऊन आपला भाऊ बार्थो लोमो यास इंग्लंडचा राजा सातवा हेन्री याच्याकडे पाठविले.तो स्वत: ही फ्रान्सच्या राजाकडे जाणार होता;पण इतक्यात अकस्मात १४९२च्या वसंत ऋतूत स्पेनच्या दरबारातून त्याला मदत मिळाली.पश्चिम युरोपातील मुसलमानांच्या हातचे शेवटचे मजबूत ठाणे ग्रॅनाडा हे स्पॅनिशांच्या हाती पडले.ज्यू लोक देशातून हाकलले गेले होते व जग आता ख्रिश्चन धर्मीयांसाठी सुरक्षित झाले होते.अर्थातच, कोलंबसाच्या योजना ऐकायला फर्डिनंड व इझँबेला यांना आता फुरसत होती.हिंदूंना फसवून ख्रिश्चन करण्याची,तशीच त्यांना लुटण्याची कोलंबसाची योजनाही त्या स्वार्थी व रानटी राजाराणींना पसंत पडली.

राजाराणीचे उत्तेजन मिळाले.पॅलास शहरातल्या काही श्रीमंत व्यापाऱ्यांनी मदत केली आणि तीन लहान गलबते घेऊन कोलंबस आपल्या ऐतिहासिक सफरीवर निघाला. 


त्या दिवशी शुक्रवार होता,ऑगस्टची तिसरी तारीख होती.त्याच्याबरोबर अठ्याऐंशी खलाशी होते.ते बहुतेक कैदी व कायदेबाह्य असे लोक होते.कोणीही प्रतिष्ठित नावाडी कोलंबसाच्या साहसात सामील व्हायला तयार नव्हते.कारण,आपण असेच पुढे गेल्यास पृथ्वीवरून खाली एकदम खोल खड्ड्यात पडू असे त्यांना वाटे.


पर्यटन सुरू झाले;प्रवासात रोमांचकारी प्रसंग फारसे नव्हते;हवा चांगली होती;खलाशांनीही बंड वगैरे काही केले नाही.ते समाधानात होते. महासागराच्या पलीकडे अपरंपार संपत्ती मिळेल या आशेने ते उत्साही होते.काही रसवेल्हाळ इतिहासकारांनी खलाशांनी कोलंबसाविरुद्ध बंड केले वगैरे कल्पित कथा दिल्या आहेत.पण तसे काही एक झाले नाही.ऑक्टोबरची नववी तारीख उजाडली.त्या दिवशी मंगळवार होता.त्या दिवशी रात्रभर डोक्यावरून पक्षी जाताना त्यांना दिसले व दुसरे दिवशी पाण्यावर तरंगत येणारी एक झाडाची फांदी दिसली. ऑक्टोबरच्या अकराव्या तारखेला उजाडता-उजाडता ते एका बेटावर उतरले.हे बेट जपानच्या बाह्य सीमेवर असावे असा कोलंबसाचा तर्क होता.पण फ्लॉरिडाच्या दक्षिणेस असणाऱ्या वेस्ट इंडिज बेटांपैकी ते एक होते.पृथ्वी वाटोळी आहे हा त्याचा तर्क खरा ठरला.पण पृथ्वीचा आकार त्याने फारच लहान कल्पिला होता.जिथे अमेरिका आहे तिथे हिंदुस्थान,जपान वगैरे पूर्वकडचे देश असतील असे त्याला वाटले.


मरेपर्यंत कोलंबसाची अशीच समजूत होती की आपण एखादे नवीन खंड शोधलेले नसून आशियालाच जाऊन पोहोचलो.


कोलंबस अज्ञात प्रदेशाच्या शोधास का प्रवृत्त झाला? त्याची महत्वा द्विविध होती;धनार्जनाची व विधर्मीयांस स्वधर्मात आणण्याची वेस्ट इंडिज बेट उतरल्यावर आपल्या दोन्ही महत्त्वाकांक्षा आता सफळ होणार असे त्याला वाटले.ऑक्टोबरच्या बाराव्या तारखेस तो आपल्या रोजनिशीत लिहितो,"हे इंडियन चांगले ख्रिश्चन होतील,चांगले गुलाम होतील." या लोकांना सहज फसविता येते हे पाहून तो आनंदला. शतो लिहितो,"या लोकांना ख्रिश्चनधर्मी करून त्यांचा उद्धार करावा अशी इच्छा मला होती;पण त्यांना बळजबरीने ख्रिश्चन धर्म देण्यापेक्षा प्रेमाने ख्रिश्चन करून घ्यावे असे मला वाटते.त्यांचा सद्भाव, विश्वास लाभावा म्हणून मी त्यांना लाल टोप्या दिल्या,काचेचे मणी दिले.फुटलेल्या आरशांचे तुकडे व फुटलेल्या चिनी मातीच्या भांड्याचे तुकडे घेऊन ते सोने देत.एका टाकाऊ पट्ट्याबद्दल एका खलाशास अडीच कॅस्टेलान्स वजनाचे सोने मिळाले तेव्हा ही फसवणूक असावी असे कोलंबसाला प्रथम वाटले व हा असमान व्यापार,ही विषम देवघेद बंद करण्याचे त्याने ठरविले.पण असे वाटण्याच्या मुळाशी न्यायबुद्धी नव्हती,तर इंडियनांचा विश्वास संपादून व त्यांची सदिच्छा मिळवून मग त्यांना गोडीगुलाबीन ख्रिश्चन करता यावे;व नीट लुटता यावे,असा त्याचा डाव होता.त्याने राजाला लिहिले,"एकदा यांचा विश्वास मला संपादन करू द्या,की मग यांना सहज ख्रिश्चनधर्मी करता येईल व जिंकता येईल.'


इंडियनांना ख्रिश्चन करणे व नंतर धनकनकसंपन्न होणे या दोन इच्छा त्याच्या मनात होत्या.या दोन गोष्टी त्याच्या रोजनिशीतील उताऱ्यांत निरनिराळ्या वेळी पुन्हा दिसतात.इंडियनांमुळे स्वर्गाला आध्यात्मिक फायदा मिळेल व आपणाला ऐहिक वैभव मिळेल,या दोन गोष्टी पुन्हा पुन्हा त्या रोजनिशीत लिहिलेल्या आहेत. तो नि:संकोचपणे राजाला लिहितो,"ही बेटे चीन व हिंदुस्थान यांच्या उंबरठ्यात आहेत.या दोन्ही देशांत अगणित संपत्ती आहे.हिरे-माणिके,मोती व सोने यांना तर अंतच नाही! तुम्हाला हवे असेल तितके सोने मी आणून देईन.तुम्हाला हवे असतील तितके गुलाम गलबतांत भरून पाठवीन." तो पुढे लिहितो,"या गोष्टीचा साऱ्या ख्रिश्चनधर्मी राष्ट्रांस आनंद वाटला पाहिजे.त्यांनी महोत्सव करावेत,प्रभूचे आभार मानावेत.लाखो लोकांना आपणास आपल्या धर्मात घेता येईल. केवढी उदात्त गोष्टी ! ही जी कृतकृत्यता,तीबद्दल प्रभूचे आभार..


अशा रीतीने कोलंबस पौर्वात्यांना सक्तीने व प्रेमाने ख्रिश्चन धर्मी व गुलाम करण्यासाठी निघाला होता पण ती गोष्ट दूरच राहून 'अमेरिकेचा संशोधक' ही पदवी त्याला आकस्मित मिळून गेली.


कोलंबस काही बाबतींत मोठा मनुष्य होता यात शंकाच नाही.विज्ञानाच्या बाबतीत तो आपल्या काळाच्या फार पुढे होता.त्याचे धैर्य व त्याची चिकाटी ही अतुलनीय होती.तो स्वप्नसृष्टीत वावरणारा एक अज्ञात मनुष्य होता.पण आपले स्वप्न प्रत्यक्ष सृष्टीत आणले जावे म्हणून त्याने राजाचे मन वळविले.अज्ञात महासागराच्या पृष्ठावर साहसाचे नवीन महाकाव्य लिहिणारा तो महाकवी होता.तो धर्मांध,संकुचित,डामडौली, स्वार्थी व अहंकारी होता.दैवाचे वैभव व सुवर्णाचा लखलखाट या दोन गोष्टींसाठी त्याने आपले सारे जीवन वाहिले होते;पण त्याचीच कसोटी लावून पाहिले तर त्याचे जीवन विफल झाले,असेच म्हणावे लागेल.त्याला परधर्मीयांस ख्रिश्चन धर्म देता आला नाही की स्पेनमध्ये सोनेही आणता आले नाही..स्पॅनिश लोकांनी इंडियनांस वाईट रीतीने वागविले.इंडियनांनीही त्यांना त्याच प्रकारे उत्तर दिले.त्यांनी जशास तसे केले.एका हातात क्रॉस व एका हातत चाबूक घेऊन येणाऱ्या या पाहुण्यांविषयी इंडियनांना विश्वास वाटेना.स्पेनमध्ये थोडे दिवस राहून कोलंबस वेस्ट इंडिज बेटांत परत आला,तेव्हा मागे ठेवलेल्या शिबंदीतील एकही मनुष्य जिवंत नाही,असे त्याला आढळून आले!


अमेरिकेत तो एकंदर चारदा आला.तो पुन्हापुन्हा सोने व हिरेमाणके शोधीत होता.पण त्याचा सारा शोध फुकट गेला.राजा फर्डिनंड अधीर झाला. कोलंबस खूप सोने आणून देईल अशी राजाची अपेक्षा होती.पण प्रत्यक्ष सोने मिळण्याऐवजी सोन्याची फक्त अभिवचनेच मिळत.

वस्तुस्थिती काय आहे,सोन्याच्या मार्गात कोणते विघ्न आहे हे पाहण्यासाठी राजाने बोबॅडिला नावाचा एक दरबारी सरदार पाठवला.बोबॅडिला आला व बेटांचे संशोधन केल्यावर त्याला असे आढळून आले,की जो प्रदेश कोलंबसाने शोधला होता, तो भिकार होता.

कोलंबसाने अपराध केला होता.त्याने राजाला फसविले होते.म्हणून त्या सरदाराने कोलंबसाला कैद करून फर्डिनंड राजासमोर कैदी म्हणून उभे केले.त्याचे हे करणे पंधराव्या शतकाच्या उत्तरार्धात स्पॅनिश न्यायनीतीचा जो प्रकार होता,त्याला अनुरूपच होते.


कोलंबस अज्ञात जन्मला व अज्ञातपणेच मेला. त्याने जगाला नवीन खंड दिले:जगाने त्याला शृंखला लेववून कृतज्ञता दाखविली ! त्याच्या शोधाचे महत्त्व त्या काळी कोणालाही समजले नाही.


इ.स.१५०३मध्ये अमेरिगो व्हेस्पुस्सी नामक इटॅलियन साहसिकाने 'नवीन जग' म्हणून एक वृत्तांत प्रसिद्ध केला.हे नवीन जग आपण १४९७ मध्ये शोधले असे तो म्हणतो.पण ती सारी असत्यकथा होती.

तथापि,त्याच वेळेस एक जर्मन प्रोफेसर जगाचा भूगोल छापीत होता,त्यात त्याने या नव्या खंडाला 'अमेरिका' असे नाव दिले.अमेरिगोने जे खोटेच सांगितले,ते खरे मानून त्याचेच नाव या नव्या खंडाला त्या जर्मन प्रोफेसराने दिले.


इतिहासातला हा केवढा विरोध आहे की,ज्याने खरोखरच प्रथम इ.स.१००० मध्ये अमेरिका शोधली त्याचे नावही कोणास माहीत नाही ! ज्याने पुन्हा दुसऱ्यांदा (१४९२मध्ये) ती शोधली त्याला अमेरिकेचा पहिला शोधक मानण्यात येते!!आणि ज्याने मुळीच काही न करता सन १४९७ साली आपण अमेरिका शोधली अशी नुसती थाप मारली,त्याचे नाव त्या नव्या जगास मिळून अमर झाले!!! घोडचुका करणारी आपली ही मानवजात खरोखरच्या कर्तृत्वाबद्दल मानसन्मान कसे वाटत असते,याचे हे एक उत्कृष्ट उदाहरण आहे.


मानवजातीची कथा - हेन्री थॉमस

अनुवाद - सानेगुरुजी

मधुश्री पब्लिकेशन - शरद अष्टेकर

१७/२/२३

विचारांची तटबंदी तोडून बाहेर पडा !

विचार,विचार आणि विचार! प्रत्येक क्षणाला व गोष्टीला जी माणसे विचारांनीच उत्तर देतात, अशी माणसे वास्तवाचे नेमके आकलन करू शकत नाहीत. ती सदैव भासचित्रात वा खोट्या कल्पनेत जगत राहतात आणि म्हणूनच सदैव अडचणीत येतात.


- अँलन वॅट्स


होल्डन कॉलफिल्ड हे लेखक जे.डी.सॅलिंजर

कादंबरीतील एक पात्र आहे.आपल्याच विश्वात ही व्यक्तिरेखा विलक्षण गुंग असते. अवतीभोवतीच्या जगात स्वतःला सिद्ध करण्यासाठी मॅनहाटनच्या रस्त्यावरून हिंडणारा तरूण - होल्डन कॉलफिल्ड ! 


उतावीळपणा,भीती,आणि लाज या तीन गोष्टींतून असमाधान आपल्याला घेरून टाकत असते.खरे तर,हे तिन्ही पाहुणे न बोलवताच आपल्या घरी येत असतात.दुःखातून वा समस्येतून बाहेर पडण्यासाठी आपण सदैव उतावीळ होत असतो.


जे. डी. सॅलिंजर या लेखकाच्या 'द कॅचेस ऑफ राय' या कादंबरीचा नायक शाळेच्या वातावरणात गुदमरलेला आहे.मोठे होण्याची भीती त्याच्या मनात दडलेली आहे.मुळात सॅलिंजर हा लेखक न्यूनगंड आणि अपरिपक्वता यांनी ग्रासलेला होता आणि हे त्याच्या आत्मचरित्रावरून लगेच लक्षात येते.


जॉन फॅन्टेच्या 'बंदिनी' कादंबरीतील अँरटूरो गर्बिअल बंदिनी ही मुख्य व्यक्तिरेखा देखील अल्टर ईगोने ग्रासलेली आहे.या पात्राला मोठा लेखक बनायचे आहे. त्या प्रयत्नात तो भेटणाऱ्या प्रत्येकाशी बोलण्याचा प्रयत्न करताना दिसतो.


प्रचंड अहंकार आणि असुरक्षिततेच्या तीव्रतम भावनांवर मात करण्यासाठी जॉन फँटेला प्रचंड झुंजावे लागले. त्याच्या मार्गात सर्वत्र धुके पसरले होते.त्यातून तो नैराश्यात गेला. या निराशेच्या भरात त्याने आपल्या लेखनाचे सर्व हक्क एका प्रकाशकाला नगण्य भावात विकले. पुढे त्याचा त्याला पश्चात्ताप झाला.मुख्य म्हणजे, आयुष्याच्या शेवटी तो आपल्या न्यूनगंडातून बाहेर पडला.


वॉकर पर्सीच्या आपल्या 'मुव्ही गोर' या कादंबरीचा नायक चित्रपटांचा शौकिन असतो. खोट्या कल्पनाचित्रात भासचित्रात रमणारा नायक वास्तवतेपासून फारकत घेऊन,आपल्याच कोशात स्वतःला गुरफटून घेतो.


वरील सर्व पात्रे ही न्यूनगंडाने ग्रासलेली आणि एकसूरी आयुष्य जगणारी आहेत.ते आपल्या विचारचक्रातून बाहेर पडूच शकत नाही.अर्थात या कादंबऱ्यांच्या लेखकांनी आपल्या अहंगंडावर वा न्यूनगंडावर तारुण्यात जर मात केली असती, तर त्यांच्या कलाकृतींनी अगदी वेगळे वळण घेतले असते.


बालकलाकार शेर्ली टेंपल हिने आपल्या आत्मचरित्रात,

आपल्या आयुष्याचा सच्चा वृत्तांत लिहिला आहे.आयुष्यात तिची झालेली फसवणूक,तिची झालेली चुकीची ऑपरेशन्स, तिच्यावर झालेला लैंगिक अत्याचार,या साऱ्या गोष्टींचा साद्यन्त वृत्तांत,तिच्या या आत्मचरित्रात आहे.इतकेच नव्हे तर,तिला अनेक क्षणी न्यूनगंडानी ग्रासल्याचेही तिने लिहिले आहे. त्यामुळे त्या अपराधीगंडामुळे ती स्वतःला घरात कोंडून घेत असे!


तुमचे प्रश्न तुम्हाला सोडवता न आल्यास तुमच्यात अपराधीपणाची भावना आकाराला येते.

अपराधीपणाची भावना ही अहंकाराचाच एक भाग आहे.ती अहंकाराशी केवळ संबंधितच आहे असे नाही तर ती अहंकाराच्या आत आहे. वाढत्या वयात व्यक्तीला अनेक समस्यांना प्रश्नांना सामोरे जावे लागते.


कधी कधी आयुष्य हीच समस्या बनते.त्यातून मग अधीरपणा आणि नैराश्य वाढीस लागते. 


प्लेटो म्हणतो:काही माणसे ही आपल्या विचाराच्या भोवऱ्यातच अडकलेली असल्यामुळेच पुढे ती न्यूनगंडानी ग्रासली जातात.


अहंगडमध्ये आपल्यातला 'मी' सतत पुढे जात, स्वतःला मिरवायला बघतो.त्यात प्रदर्शनाचा मोठा भाग असतो.'मी'ला मिरविणे,सतत 'मी'चे कर्तृत्त्व व कौतुक,

मोठेपणाचा हव्यास या गोष्टी अहंगडात येतात,तर न्यूनगंडातला 'मी' मात्र सतत मागे मागे आपल्या स्वतःच्या कोशात राहण्याचा प्रयत्न करतो.सतत स्वतःला दोष देत राहणे,कमी लेखणे तसेच स्वतःला झाकून ठेवणे, स्वतःला व्यक्त करण्यास घाबरणे... या सारख्या गोष्टी न्यूनगंडात येतात. 


एक आत्मसंतुष्ट नेतृत्त्व म्हणून सिव्हिल वॉर जनरल जॉर्ज मॅकलीन यांचा नेहमीच उल्लेख केला जातो.स्वतःच्या कल्पनाविश्वात जॉर्ज मग्न राहिल्यामुळे तो आपल्या भूमिकेवर व धोरणांवर नेहमी खूष रहायचा! यातही प्रत्यक्ष नेतृत्त्व करण्याची वेळ जेव्हा त्याच्यावर आली,तेव्हा त्याच्या गाडीची चाके चिखलात रुतून बसली. एकूणच,आपल्या विचारांची तटबंदी तोडून बाहेर पडत,प्रत्यक्ष कृती त्याच्या हातून कधी घडली नाही.

परिणामतः त्याला मोठ्या टीकेला सामोरे जावे लागले.


जॉर्जला वाटायचे की,आपल्या शत्रूचे सैन्यबळ वाढत चाललेले आहे.खरे तर तसे काहीही नव्हते.वस्तुतः तीन वेळा त्याला शत्रूवर मात करण्याची संधी लाभली होती,पण तो त्याचा फायदा घेऊ शकला नाही.दुसरे असे की, राजकीय विरोधक आपल्याविरुद्ध कट-कारस्थाने करीत असल्याचे जॉर्जला सतत वाटायचे! हे विरोधक एक दिवस आपल्यावर मोठ्या आक्रमकतेने आक्रमण करतील,असे त्याला वाटायचे! वास्तविक तसे काही नव्हते! हे सारे त्याच्या कल्पनांचेच खेळ होते.


भ्रम-भामकता,खोटी स्वप्ने यात रमणाऱ्या जॉर्जला वाटायचे की,एक परिपूर्ण नियोजन आणि एक निर्णायकी मोहिम आपल्याला विजय मिळवून देण्यासाठी पुरेशी आहे.आपली मोहिम यशस्वी होऊन आपण मोठा विजय प्राप्त केला आहे,अशी स्वप्ने त्याला पडत असत! असा विजय प्राप्त केल्याबद्दल तो स्वतःचेच अभिनंदन करायचा! आपल्या धारणा,खोट्या कल्पना-विचार यात जॉर्ज इतका अडकला होता की,प्रत्यक्ष कृती त्याने कधीच केली नाही. इतकेच नाही तर, वाट्याला जर अपयश आले, तर त्याचे खापर तो आपल्या सहकार्यांवर

काढत असे कोणा वरिष्ठानी जाब विचारला,तर तो एखाद्या चिडखोर मुलाप्रमाणे चिढायचा, आकांडतांडव करायचा! त्याच्या भ्रमिष्ठ वर्तनाला सारेच होते.धरसोड वृत्तीमुळे जॉर्ज आपल्या आयुष्यात कधी यशस्वी होऊ नाही.


जार्ज मॅकलीनचा अहंकार विराट असल्याचा उल्लेख इतिहासकारांनी केला आहे.त्याचा फाजिल आत्मविश्वास अगदी हास्यास्पद ठरला, स्वतःच्या कर्तृत्वाचे खोटे रिपोर्टस तयार केले होते.अर्थात पुढे ते सारे उघडकीस आल्यामुळे जॉर्जची मोठी नाचक्की झाली.


आपण कोणीतरी असामान्य आहोत,आपले कर्तृत्त्व देदिप्यमान असून आपण विलक्षण बुद्धिमान आहोत,असा अनेकांचा गोड गैरसमज असतो.त्यामुळे अशी माणसे अनेकदा तोंडावर आपटतात.तसे पाहता आपण सारे जण हे नैराश्य,उदासीनता,अधीरता,संशय,नपुंसकता, दुःख,वेदना,लहरीपणा,क्रोधविवशता यांनी या ना त्या प्रकारे ग्रासलेले असती.इतकेच नाही तर, आपण सारे वय वाढल्यानंतरही पौंगडावस्थेतील तरुणाप्रमाणे वागत राहतो.अर्थात याला काही अपवाद असू शकतात.


पौगंडावस्थेतील शारीरिक बदलांमुळे मुलामुलींच्या मनाची अवस्था चमत्कारिक होते, तर काही वेळा ती गोंधळून व घाबरून जातात. पालकांशी त्यांची जवळीक कमी होऊन त्यांच्यात समवयीन,समविचारी व भिन्नलिंगी व्यक्तींकडे आकर्षण वाढू शकते.स्वतःचे व्यक्तिमत्त्व आकर्षक ठेवण्याकडे कल वाढू लागतो.काही मुलामुलींच्या चेहऱ्यावर विशिष्ट पुळ्या (तारुण्यपीटिका) उठू लागतात.मुलींमध्ये त्याचे प्रमाण अधिक असते.त्यामुळे त्यांच्यात एक प्रकारचा गंड निर्माण होऊ शकतो.आपल्या आवडीनिवडीवर पालकांनी लादलेली बंधने व शिस्त बहुधा या वयात मुलेमुली झुगारून देऊ शकतात.


सामाजिक,राजकीय,शैक्षणिक व नैतिक अशा विषयांवर चर्चा होऊन मुलेमुली स्वतःची मते धीटपणे मांडायला लागतात.त्यांची कामाची व अभ्यासाची क्षमता वाढते,मात्र काही वेळा या वयातील मुलामुलींमध्ये भावनिक तणाव, आईवडिलांशी वाद,चिडचिडेपणा व नैराश्य अशी लक्षणे दिसून येतात. परिणामी काही वेळा नकारात्मक विचारांमुळे उद्धटपणा,हिंसक वृत्ती, व्यसनाधीनता,

न्यूनगंड,लैंगिक व्याधी,अस्थिरता इ.परिणाम दिसून येतात.


काही माणसे ही रस्त्याने चालत असताना अद्भुत कल्पना रम्य कल्पनात गुंगलेली आढळतात. कानात हेडफोन घालून आपल्याच विश्वात गुंग असतात.

अवतीभवती काय घडते आहे याचे त्यांना थेंबभर देखील भान नसते.भोवताली घडणाऱ्या गोष्टीत सहभागी न होता ते आपल्या डोक्यातील विचार चक्रात कैद होऊन गेलेली असतात.परिणामतः कमालीचे मुडी,संशयी, भयगरस्थाने आणि सामान्यता यांनी वेढलेली राहतात.



जनरल मार्शल यांना दुसऱ्या महायुद्धाच्या काळात डायरी लिहिण्याची विनंती अनेकांनी विनंती केली होती,पण त्यांनी ती नम्रपणे नाकारली होती.डायरी लिहिणे हे एकप्रकारे, आपण किती मूलगामी व महत्वाचे काम करीत आहोत,आपले कर्तृत्त्व,आपल्या भूमिका, आपली तत्त्वे,विजयाकडे व शिखराकडे जाणारी आपली वाटचाल,वाट्याला आलेल्या वेदनेवर सहजपणे आपण कशी मात केली... या आणि अशा गोष्टींचे नोंदणीकरणच असते. प्रत्यक्षात त्याचा तसा उपयोग नसतो. कोणीही आपल्या पराभवाची,नैराश्याची,वैगुण्याची तसेच आपल्यातील अहंगडाची वा न्यूनगंडाची कहाणी मांडत नाही,अहंगंडाला ठेच लागून आपण कसे शहाणे व समंजस झालो,असे कोणीही लिहिताना मला तरी दिसले नाही.


भ्रामक कल्पनांचे खेळ आपल्याला सर्वांनाशाच्या दरीत लोटू शकतात.म्हणूनच आपण भासचित्रातून वा खोट्या कल्पनातून वेळीच बाहेर पडले पाहिजे.स्वतःचे नेमके आकलन करून घेत वास्तवतेचा आपण सन्मान केला पाहिजे.अवतीभोवती घडणाऱ्या गोष्टीत सहभागी व्हा!

आकलनातील वैभव व समंजसपणा

दिवसागणिक वाढवत न्यायला हवा!स्वच्छ मोकळेपणासह संपूर्ण वर्तमानात जगणे,

यासाठी मोठे ध्येय लागते.तेही मोठ्या निर्मितीक्षमतेने शहाणपणात वाटचाल करत राहणे,नेहमीच मूल्यवान ठरते.


इगो इज द् एनिमी - रॉयन हॉलिडे

या पुस्तकातून सन्मानाने

गोयल प्रकाशन