* विजय गायकवाड | Vijay Gaikawad

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

२३/६/२३

द रिपब्लिक - प्लेटो (इसपू तिसरं ते चौथे शतक)

'रिपब्लिक' या ग्रंथाच्या पहिल्या भागात प्लेटोनं न्याय आणि आदर्श समाज याबद्दल,तर दुसऱ्या भागात तत्त्वज्ञ कसा असावा याविषयी आणि तिसऱ्या भागात समाजावर शासन करणारा शासक कसा असावा याविषयी लिहिलंय. माणसाचं विश्वबंधुत्व,सुप्रजननशास्त्र(यूजेनिक्स), समाजवाद,साम्यवाद (कम्युनिझम),स्त्री-वाद(फेमिनिझम),

संतती नियमन (बर्थ कंट्रोल), मुक्तप्रेम (फ्री - लव्ह),मुक्त अभिव्यक्ती स्वातंत्र्य, नैतिकतेचे मापदंड,मालमत्तेवर

सार्वजनिक मालकी,स्त्रिया आणि मुलं हे सगळं प्लेटोनं 'रिपब्लिक' मध्ये मांडलं आहे.


ख्रिस्तपूर्व ३८० मध्ये प्लेटो या ग्रीक तत्त्वज्ञानं 'रिपब्लिक' नावाचा एक ग्रंथ लिहिला.या ग्रंथामध्ये खरं तर प्लेटोचा मित्र आणि त्याचा गुरू असलेला सॉक्रेटिस यानं त्याच्याबरोबर केलेला संवाद होता.


सॉक्रेटिस प्रत्येक गोष्टीबद्दल शंका व्यक्त करायचा आणि प्रश्न उपस्थित करायचा.तरुणांमध्ये यामुळे तो खूपच लोकप्रिय होता.त्या वेळच्या प्रस्थापितांना हे मुळीच आवडणारं नव्हतं.म्हणून सॉक्रेटिस तरुण मुलांना बिघडवतोय,असे त्या वेळच्या उच्चभ्रू लोकांनी सॉक्रेटिसवर आरोप दाखल केले.त्याला अंधारकोठडीत टाकलं आणि इतकंच नाही तर त्याला हेमलॉक नावाचं विषही प्यायला दिलं. 


सॉक्रेटिस आणि थ्रेसिमॅक्स नावाच्या त्याच्या विरोधकात जी चर्चा झाली,ती न्याय या विषयाला धरून झाली आणि त्यांच्यातलं संभाषणच प्लेटोनं 'रिपब्लिक' या ग्रंथात मांडलं.


'रिपब्लिक' हा ग्रंथ म्हणजे सॉक्रेटिस आणि प्लेटो या दोन महादिग्गजांना एकाच वेळी भेटण.! प्लेटोच्या आयुष्यातलं आणि जगावर प्रभाव पाडणारं हे एक उत्कृष्ट कार्य समजलं जातं.या ग्रंथाच्या पहिल्या भागात त्यानं न्याय आणि आदर्श समाजाबद्दल भाष्य केलं,तर दुसऱ्या भागात तत्त्वज्ञ कसा असावा याविषयी आणि तिसऱ्या भागात समाजावर शासन करणारा शासक कसा असावा याविषयी त्यानं लिहिलंय.


'न्याय' ही संकल्पना काय आहे याविषयी विचार करता करता प्लेटोनं आपल्या आयुष्यात ज्या अनेक गोष्टी,

कल्पना किंवा तत्त्वं आहेत त्या सगळ्यांना स्पर्श केला.

यामध्ये माणसाचं विश्वबंधुत्व,सुप्रजननशास्त्र (युजेनिक्स), समाजवाद,साम्यवाद (कम्युनिझम),स्त्री-वाद(फेमिनिझम),

संतती नियमन (बर्थ कंट्रोल), मुक्तप्रेम ( फ्री - लव्ह),मुक्त अभिव्यक्ति-स्वातंत्र्य,नैतिकतेचे एक किंवा दोन मापदंड,

मालमत्तेवर सार्वजनिक मालकी,स्त्रिया आणि मुलं अशा अनेक गोष्टींविषयीच्या तत्त्वांविषयी प्लेटोनं विचार केला आणि ते सगळं त्यानं 'रिपब्लिक' मध्ये मांडलं.जे योग्य आहे तसंच माणसानं वागावं असं त्याला वाटत असे.

अशा तऱ्हेचं न्याय्य जग निर्माण करण्याच्या मागे तो लागला होता आणि त्यातून 'रिपब्लिक' या ग्रंथाचा जन्म झाला.


प्लेटोचं 'रिपब्लिक' म्हणजे एक आदर्श राज्य किंवा युटोपियाच होता.जन्मापासून ते मृत्यूपर्यंतच्या आयुष्याचं ते एका तऱ्हेनं चित्रणच होतं.त्याच्या 'रिपब्लिक'मध्ये मुलाची वाढ कशी होईल,कोणी कोणी काय काय काम करावीत याचं सखोल वर्णन प्लेटोनं केलेलं आहे. त्याच्याप्रमाणे रिपब्लिकमध्ये जन्मलेली सगळी मुलं ही सगळ्या टोळीची एकत्रितपणे म्हणजेच सगळ्यांची असतील.कुठल्याही एका माणसाचं ते मूल नसेल.त्यातली सगळ्यात चांगले पुरुष निवडून,त्यातल्या सगळ्यात चांगल्या स्त्रिया निवडून त्यांचं मीलन झाल्यानंतर जी मुलं होतील ती मुलं सगळ्या टोळीनं वाढवायची,अशी त्याच्यामध्ये एक कल्पना होती.यालाच सुप्रजननशास्त्र किंवा युजेनिक्स म्हणतात. कुणीही स्वतःस्वतंत्र व्यक्तिगत लग्न करणं किंवा व्यक्तिगत कुटुंब थाटणं अशी कल्पनाच 'रिपब्लिक'मध्ये नव्हती.मुलं झाली रे झाली की ती ताबडतोब सरकारनं चालवलेल्या पाळणाघरात हलवली जातील,असंही त्यात लिहिलं होतं.त्यामुळे कुठल्याही आई-वडिलांनी आपल्या मुलांवर हक्क दाखवता कामा नये, असंही त्याचं मत होतं.तसं केल्यामुळे सर्वांमध्ये बंधुभाव निर्माण होईल आणि कुणीही एकमेकांवर आपल्या मुलांविषयीचा हक्क लादणार नाही,कारण सगळी मुलं सगळ्यांची असतील अशी त्याची ही थिअरी होती. थोडक्यात,ते एक कम्यून होतं,असं प्लेटोचं म्हणणं होतं.


आई-वडिलांच्या बाबतीत बोलायचं झालं तर 'रिपब्लिक' नुसार कुठलाही पुरुष कुठल्याही स्त्रीबरोबर लैंगिक संबंध ठेवू शकत होता. थोडक्यात,आज ज्याला आपण नीतिमत्ता म्हणतो तशा प्रकारची नीतिमत्ता प्लेटोला अभिप्रेत नव्हती.त्यामुळे ज्या वेळी ज्या पुरुषाला ज्या स्त्रीबरोबर जायचं असेल आणि तिची संमती असेल तेव्हा त्यांनी फ्री लव्ह म्हणजे मुक्तपणे प्रेम करावं,असं प्लेटोचं म्हणणं होतं.


कोणाच्याही खासगी आयुष्यात सरकारनं अजिबात डोकावता कामा नये,असं त्यानं लिहिलं होतं.मुलांच्या वाढीबाबत तर प्लेटोच्या कल्पना फारच गंमतीशीर होत्या.

मुलांनी जन्मापासून ते वयाच्या २०व्या वर्षापर्यंत फक्त व्यायाम आणि संगीत यांच्यावरच भर द्यावा आणि याच गोष्टी शिकाव्यात.त्यामुळे समतोल राहतो,असं त्याचं म्हणणं होतं.संगीतामुळे मनाचा समतोल राहतो आणि व्यायामामुळे शरीराचा; आणि त्यामुळे जगामध्ये अराजक किंवा गोंधळ माजणार नाही,असं प्लेटो म्हणत असे.

ज्याला संगीत आवडत नाही त्या माणसावर आपण विश्वाससुद्धा ठेवू नये,असं त्याचं म्हणणं होतं. संगीतामधली हार्मनी आणि समतोलपणा आपल्या जगाला एकसंध ठेवायला मदत करतं आणि म्हणून संगीत महत्त्वाचं आहे,असं त्याचं म्हणणं होतं.यात गंमत अशी की,शिकत असताना,व्यायाम करत असताना मुलं आणि मुली यांनी पूर्ण नग्नावस्थेत व्यायाम केला पाहिजे,असं त्याचं म्हणणं होतं.याचं कारण मानवी शरीर हे उदात्त आणि सुंदर आहे;त्यात लाज बाळगण्यासारखी कुठली गोष्ट आहे? आपण आपल्या गुणांची वस्त्र परिधान केलेली असतात.त्यामुळे या बाह्य वस्त्रांची गरजच काय, असंही प्लेटो म्हणत असे.शिकण्यात आणि शिकवण्यातही खूप मजा यायला पाहिजे,ते कंटाळवाणं होऊ नये म्हणून प्लेटो अतिशय दक्ष होता.


वयाच्या २०व्या वर्षानंतर या मुलांनी काय करायचं? त्यांच्यामधले जे सशक्त तरुण असतील,जे पुढे जाऊ शकतील आणि जे पुढे शिक्षण घेऊ शकतील अशी मंडळी वेगळी करायची आणि जी पुढे शिक्षण घेऊ शकणार नाहीत,ज्यांची क्षमता नाही अशी मुलं वेगळी करायची,

असं प्लेटो म्हणायचा.जे खालच्या क्षमतेचे असतील ते शेतकरी,कामगार किंवा मजूर होतील किंवा उद्योजकसुद्धा होतील,असं प्लेटोचं म्हणणं होतं.थोडक्यात,

उद्योजकांनासुद्धा तो खालचाच समजायचा.तसंच जे याच्यापुढे शिक्षण घेऊ शकतील अशा लोकांनी वयाच्या २० ते ३० वर्षांपर्यंत विज्ञान,गणित,अंकगणित, भूमिती आणि खगोलशास्त्र या शाखांमध्ये शिक्षण घ्यावं,असं त्याचं म्हणणं होतं;पण अंकगणित किंवा भूमिती शिकताना त्याचा उपयोग करावा असं मात्र त्याला फारसं वाटत नसे.गंमत म्हणजे पूल बांधताना,शेती करताना किंवा कुठलीही यंत्र बनवताना या गणिताचा उपयोग करणं म्हणजे तो खालच्या दर्जाचं समजत असे.हा गणिताचा उपयोग नाही.याचं कारण त्या वेळी ग्रीसमध्ये विकासामध्ये आपल्या आजूबाजूची भौतिक परिस्थिती सुधारण्यापेक्षा आपल्या आत्म्याची आणि मनाची शांती यात आपली प्रगती व्हावी अशी त्यांची समजूतच होती आणि प्लेटोचीही तशीच समजूत होती.


'रिपब्लिक' प्रमाणे ३० वय झाल्यावर म्हणजे शिक्षण पूर्ण झाल्यावर या मुलांना आणखी एक परीक्षा द्यावी लागत होती.या परीक्षेत जे पास होणार नाहीत,ते मात्र या शिक्षणातून बाहेर पडतील.अशांना प्लेटो 'मध्यमवर्गीय' म्हणायचा आणि अशांनी सैन्यात भरती होऊन देशाचं रक्षण करावं,असं तो म्हणायचा,प्लेटोला युद्ध आवडत नसे.त्यामुळे या सैन्यांनी आक्रमण कधी करू नये,फक्त संरक्षण करावं,असं त्याचं म्हणणं होतं. यातून जे उरलेले असतील,त्यांनी मात्र तत्त्वज्ञान शिकावं,असं त्याचं मत होतं,तत्त्वज्ञानाचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी राज्यकर्ते म्हणून काम करावं,असं प्लेटो म्हणायचा.


या सगळ्या प्रशिक्षणामध्ये पुरुष आणि स्त्रिया यांच्यामध्ये पूर्ण समानता प्लेटोला अभिप्रेत होती.शिक्षणानंतर पाच वर्षांचं प्रशिक्षण पूर्ण झालं की,ही मंडळी आता प्रत्यक्ष कृतीसाठी तयार झाली आहेत,असं त्याचं म्हणणं होतं. वयाच्या ३५ शी नंतर त्यांनी राज्य कसं चालवावं याचा पोस्ट ग्रॅज्युएट कोर्स केला पाहिजे,अशी प्लेटोची एक धारणा होती.प्रत्यक्ष राज्य चालवण्याअगोदर त्यांना एकंदरीत समाजाचं, तिथल्या परिस्थितीचं,तिथल्या कायद्याचं आणि तिथल्या प्रश्नांचं गांभीर्य कळायला पाहिजे आणि मगच त्यांनी राज्यकर्ते व्हायला पाहिजे. थोडक्यात,त्यांनी अँप्रेंटिसशिप केली पाहिजे, असं त्याचं म्हणणं होतं आणि ही अँप्रेंटिसशिप प्लेटोच्या मते १५ वर्ष चालणार होती.५० वय ओलांडलं आणि या सगळ्या पायऱ्या त्यानं ओलांडल्या,की तो तत्त्वज्ञ हा राजा (फिलॉसॉफर किंग) झाला,असं प्लेटोचं म्हणणं होतं.असे तत्त्वज्ञ आणि अशी तयार झालेली माणसं जर शासक किंवा राज्यकर्ती झाली तर एक चांगलं आदर्श राज्य निर्माण होईल,असं प्लेटोला वाटायचं.म्हणूनच तत्त्वज्ञांनी राज्य करावं किंवा राज्यकर्त्यांनी तरी तत्त्वज्ञ व्हावं,असं प्लेटो नेहमी म्हणायचा.हे तत्त्वज्ञ शासक उच्च वर्गातले असले पाहिजेत आणि त्यांनीच राज्य करावं असं प्लेटो म्हणे.या वर्गाखाली आणखी दोन वर्ग होते.एक म्हणजे सैनिकांचा आणि दुसरा म्हणजे शेतकरी, कष्टकरी आणि उद्योजकांचा.या दोन्ही वर्गांनी तत्त्वज्ञ राज्यकत्यांचं म्हणणं ऐकलं पाहिजे आणि त्यांच्या आज्ञा पाळल्या पाहिजेत

,असं प्लेटो म्हणायचा.तसंच आश्चर्य म्हणजे राजाकडे खासगी मालमत्ता असता कामा नयेत,असं प्लेटोनं सांगितलं.तत्त्वज्ञ राज्यकर्त्यांनी जनतेबरोबर राहावं,

जनतेबरोबर उठावं,बसावं, जेवावं,झोपावं; त्यामुळे भ्रष्टाचार होणार नाही, असं त्याला नेहमी वाटायचं राज्यकत्यांसाठी वेगळी व्यवस्था करायला हवी,असं त्याला वाटत नसे.वैयक्तिक स्वार्थ आणि स्वतःची वैयक्तिक संपत्ती नसेल तर ते नेहमी न्यायाच्या बाजूनेच काम करतील,असं प्लेटोला वाटत असे.


'रिपब्लिक' ग्रंथ जगासमोर आणणारा प्लेटो होता तरी कोण ?


प्लेटोचा जन्म हा ख्रिस्तपूर्व ४२४ मध्ये ग्रीस देशातल्या एजना या अँथेन्स नगरामध्ये झाला. त्याचं खरं नाव ॲरिस्टोकल्स असं होतं;पण ग्रीक भाषेत प्लेटॉन म्हणजे रुंद आणि प्लेटोचे खांदे रुंद असल्यामुळे प्लेटो हे नाव त्याला बहाल झालं होतं. त्याचं लहानपण सुखात गेलं.प्लेटो कुस्ती खेळण्यात पटाईत होता.

लहानपणापासून प्रकृतीनं तो दणकट असल्यामुळे त्यानं सैनिक म्हणूनही काम केलं. तसंच तो दिसायलाही देखणा असल्यामुळे त्याच्यामागे अनेक तरुण- तरुणींचे घोळके असत.तो तरुणपणी कविताही करत असे. आपण खूप मोठा कवी होण्याची स्वप्नं तो बघत असे.


वयाच्या २० व्या वर्षी एकदा एका स्पर्धेसाठी आपलं संगीत नाटक द्यायला जात असतानाच त्यानं वाटेत चाललेलं सॉक्रेटिसचं भाषण ऐकलं.सॉक्रेटिसच्या बोलण्याकडे तो इतका आकर्षिला गेला,की त्यानं आपल्या कविता चक्क जाळून टाकल्या.प्लेटोन सॉक्रेटिसचं शिष्यत्व पत्करलं. 


सॉक्रेटिसच्या काळात आपण जन्माला आलो, ही फार मोठी भाग्याची गोष्ट आहे,असं प्लेटो म्हणायचा.सद्गुण म्हणजेच ज्ञान,असं सॉक्रेटिस म्हणायचा.प्लेटोचंही तेच मत झालं होतं. प्लेटोच्या काळात गुलाम,स्त्रिया आणि मुलं यांना राजकारणात भाग घ्यायला परवानगी नव्हती.


प्लेटो ३० वर्षांचा असताना सॉक्रेटिसवर मुलांची मनं भडकवण्याचा आरोप होऊन त्याला मृत्युदंड देण्यात आला.प्लेटोच्या समोर हे सगळं घडल्यामुळे प्लेटोला अतोनात दुःख झालं.पळून जाण्याची शक्यता असूनदेखील सॉक्रेटिसनं मृत्युदंड स्वीकारला याचा प्लेटोवर खूप मोठा परिणाम झाला.त्यामुळे राज्यव्यवस्थेतच बदल केला पाहिजे,राज्यव्यवस्थेतच चूक असली पाहिजे नाही,तर सॉक्रेटिसचे प्राण गेले नसते, असं प्लेटोला वाटायला लागलं आणि आदर्श राज्यव्यवस्था कुठली याचा शोध घेण्याचं प्लेटोनं ठरवलं.तुरुंगात असताना सॉक्रेटिसनं जे काही संभाषण केलं त्याला 'डायलॉग्ज' म्हणतात; ते डायलॉग्ज प्लेटोनं नंतर लिहून काढले.हे जे डायलॉग्ज आहेत ते प्रत्यक्ष सॉक्रेटिसचे आहेत का प्लेटोनं त्यात स्वतःचेही विचार मांडले आहेत याच्याविषयी बरीच मतमतांतरं आहेत;पण त्यामधून सॉक्रेटिसचे आणि प्लेटोचे विचार आपल्याला वाचायला मिळतात.


ख्रिस्तपूर्व ३९९ मध्ये प्लेटोन अँथेन्स सोडलं आणि ख्रिस्तपूर्व ३८६ पर्यंत म्हणजे जवळजवळ १३ वर्षं तो चक्क अज्ञातवासात गेला.त्या वेळी त्याच्या मनात अनेक वादळ उठली होती. त्यानं ३० शासकांच्या राजवटी बघितल्या आणि त्यांचं अपयशही बघितलं.त्यानंतर येणाऱ्या लोकशाही राजवटीत तरी चांगली समाजराज्य व्यवस्था निर्माण होईल असं त्याला वाटलं होतं; पण याच राजवटीत त्यानं आपला परममित्र आणि गुरू सॉक्रेटिस याचा मृत्युदंडही बघितला होता.त्यामुळे त्याचा कुठल्याही राज्यव्यवस्थेवरचा आणि सरकारवरचा विश्वासच उडाला होता.जर तत्त्वज्ञच राज्य चालवायला लागले किंवा राज्यकर्तेच तत्त्वज्ञ बनले तरच जी राज्यव्यवस्था निर्माण होईल ती आदर्श असेल, असं त्याचं ठाम मत बनलं.हे सगळं आपल्याला "रिपब्लिक'मधल्या सातव्या पत्रामध्ये (सेव्हन्थ लेटर) वाचायला मिळतं..


प्लेटोच्या तत्त्वज्ञानाकडे जर बघायचं असेल तर त्या वेळची परिस्थिती काय होती हे बघावं लागेल.प्लेटो अँथेन्समध्ये वाढला.अँथेन्स म्हणजे ग्रीसमधला डोंगर-टेकड्यांचा एक प्रदेश होता.त्या वेळी ग्रीस छोट्या छोट्या सिटी स्टेट्समध्ये म्हणजे नगर राज्यांमध्ये विभागलं गेलं होतं.अँथेन्समध्ये ४-५ हजार लोक राहात असत.तिथे लोकशाही पद्धतीनं राज्यकारभार चालत असे.सर्व पुरुषांना त्या वेळी राज्यकारभारात सहभागी होता येत असे. अँथेन्सशेजारी जी नगर राज्यं होती,तिथे मात्र वेगवेगळ्या तऱ्हेची राज्यव्यवस्था होती. ग्रीसमध्ये त्या वेळी अँथेन्स आणि स्पार्टा अशी दोन नगर राज्य म्हणजे "सिटी स्टेट्स' होती. त्यामध्ये खूप मिन्नता होती. म्हणजे अथेन्स हे सामाजिक,आर्थिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या पुढारलेलं लोकशाही राज्य होतं,तर स्पार्टा मात्र क्रीडा म्हणजे खेळ आणि युद्ध या क्षेत्रांत प्रगत असलेल मूठभर श्रीमंतांचं शासन असलेलं राज्य होतं.या दोन नगर राज्यांमध्ये जे युद्ध झालं ते बेलोपोनेशियन युद्ध म्हणून ओळखलं जातं. या युद्धामध्ये अँथेन्सचा पराभव झाला.या पराभवाची कारणं शोधताना प्लेटोन आपले राजकीय विचार मांडायला सुरुवात केली. ते विचारसुद्धा सॉक्रेटिसच्या "डायलॉग्जवरच आधारलेले होते.प्लेटोला तीन महत्त्वाचे प्रश्न खुणावत होते.'न्याय म्हणजे काय?' तसंच 'राज्य कोणी करावं' आणि 'कसं राज्य करावं?' असे मूलभूत प्रश्न प्लेटोन स्वतःला विचारले आणि त्यातूनच खऱ्या अर्थानं 'रिपब्लिक ग्रंथाचा जन्म झाला.


"रिपब्लिक' या ग्रंथात प्लेटोनं त्याच्या आदर्श राज्याच्या कल्पना मांडल्या होत्या.चित्रकार आणि संगीतकार यांना समाजबाह्य ठरवावं,असं तो म्हणत

असे.गुन्हेगारांना गुन्हे करण्यापासून थोपवावं,त्यांचं मन वळवावं,पण त्यांना शिक्षा करू नये,असं प्लेटो म्हणत असे,कारण त्यांच्यातली गुन्हेगारी प्रवृत्ती त्यांच्या अज्ञानातून निर्माण झालेली आहे आणि आपण त्यांना ज्ञान दिलं की,त्यांची ही प्रवृत्ती कमी होईल,असे प्लेटोला वाटत असे. 


प्लेटोच्या 'रिपब्लिक मध्ये वकिलांना तो दुष्ट म्हणायचा.

जिथे ज्ञान आहे तिथे खरं तर खटले आणि कायदा यांची गरजच राहणार नाही,असं तो म्हणायचा.'रिपब्लिक' मध्ये जे काही कायदे असतील ते थोडेच असतील.ते सोपे आणि लोकांना समजतील असे असतील.याचं कारण कोणताही नवीन कायदा निर्माण केला की,तो तोडण्याची इच्छा निर्माण होईल आणि ते तोडणारे बरेच निर्माण होतील,असंही प्लेटोला वाटत असे.तसंच राज्यकर्त्याचे मुख्य काम हे प्रजेला आनंदी ठेवणं आणि त्यांचं आरोग्य सांभाळण हेच आहे.असं तो म्हणायचा.


आपली कारणमीमांसा आपल्या मेंदूत आपलं स्पिरिट आपल्या हृदयात,तर आपली भूक आपल्या पोटात दडलेली असते आणि या सगळ्या गोष्टी आपल्या पाठीतल्या कण्यातल्या 'मॅरोज'नं एकमेकांशी जोडलेल्या असतात,असं प्लेटोला वाटायचं.गमतीची गोष्ट म्हणजे आपल्या भावना आपल्या रक्तवाहिन्यांमधून वाहतात, असंही तो म्हणायचा.आपल्या स्मृती या मेणाच्या ब्लॉकसारख्या असतात,त्यावर आपण काही कोरलं तर जसं ते टिकून राहतं तशीच आपली स्मृती असते आणि काही मेण जसं वितळत तसंच काहींच्या फारसं लक्षात राहत नाही, असंही तो म्हणायचा.आपण आपला अनुभव आपल्या मनाच्या कोऱ्या पाटीवर लिहीत असतो आणि त्यातूनच आपलं ज्ञान वाढतं, असं प्लेटोचं म्हणणं होतं.


प्लेटोचा आत्म्यावर विश्वास होता.आज आपण ज्याला मन म्हणतो,त्याला प्लेटो आत्मा म्हणायचा.आपल्या शरीरापेक्षा आपला आत्मा ही एक वेगळी गोष्ट असते,

त्यामुळे आपलं शरीर नष्ट झालं तरी आत्मा जिवंतच असतो,असं त्याला वाटायचं,आपल्याकडेही आत्मा अमर आहे,अस आपण म्हणतो तसाच हा प्रकार होता. आपली बुद्धी मात्र आपल्या डोक्यात असते, असं प्लेटोला वाटायचं.प्लेटोनं त्याच्या मानसशास्त्रामध्येही भूमिती आणली होती. त्याच्या मते गोलाकार हा परिपूर्ण असा आकार असतो.माणसाचं डोकं हे सर्वसाधारणपणे गोलाकार असल्यामुळे त्यातला मेंदू हाच आपलं मन नियंत्रित करत असला पाहिजे,असं त्याचं मत होतं.खरं तर त्याचं मत बरोबर असलं तरी ते मत विचित्र अशा युक्तिवादानं तयार झालेलं होतं.


पृथ्वी,जल,वायू आणि अग्नी यातूनच माणसाच्या प्रकृती तयार झाल्या.माणसाच्या सारं काही निमूटपणे स्वीकारण्याच्या वृत्तीचा संबंध पाण्याशी,संतापीपणाचा संबंध अग्रीशी, उदासीनतेचा संबंध पृथ्वीशी आणि उत्साही वृत्तीचा संबंध हवेशी असून जेव्हा या चारही वृत्ती एकत्र होतात तेव्हा माणूस चैतन्यमय दिसतो आणि या चारही वृत्तींचा समतोल साधलेला मनुष्य समाधानी असतो.कुठल्याही वृत्तीचा अतिरेक झाला,तरी त्या माणसांत दोष निर्माण होतो,असं प्लेटोचं तत्त्वज्ञान होतं आणि त्या काळचा इटलीतला जगविख्यात असलेला चित्रकार लिओनार्दो दा व्हिंची याच्यावर प्लेटोच्या तत्त्वज्ञानाचा खूप मोठा प्रभाव होता.


प्लेटोच्या डिक्शनरीमध्ये त्याच्या तत्त्वज्ञानाप्रमाणे ब्युटी म्हणजे सौंदर्य,जस्टिस म्हणजे न्याय,लव्ह म्हणजे प्रेम या जवळपास सारख्याच आणि महत्त्वाच्या कल्पना होत्या.

फक्त थिअरी मांडून प्लेटोचं समाधान होत नव्हतं.त्याला हे आदर्श चित्र प्रत्यक्षात उतरवायचं होतं.त्यामुळे चिनी तत्त्वज्ञ कन्फ्युशिअस प्रमाणेच त्यानं आपल्या कल्पना प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे डायोनिसिअस यानं जेव्हा प्लेटोला राज्यविषयक

सल्ला द्यावा म्हणून आमंत्रण दिलं तेव्हा तो सायराक्यूसला गेला आणि तिथल्या सम्राटाला राज्य कसं करायचं याविषयी धडे द्यायला सुरुवात केली;पण डायोनिसि हा फक्त राजा होता.तो काही तत्त्वज्ञ नव्हता आणि त्यामुळे प्लेटोच्या क्रांतिकारी कल्पना त्याला आवडल्या नाहीत आणि त्यानं प्लेटोला चक्क मृत्युदंड देण्याची धमकी दिली.या वेळी प्लेटोच्या काही मित्रांनी मध्यस्थी केली आणि त्यामुळे प्लेटोची सुटका झाली.


वयाच्या ८१ व्या वर्षी एका मित्राच्या लग्नसमारंभाला गेला असताना तिथले आवाज सहन न झाल्यानं तो विश्रांती घेण्यासाठी शेजारच्या खोलीत गेला आणि विश्रांती घेत असतानाच प्लेटोचा मृत्यू झाला.आज प्लेटो आणि सॉक्रेटिस नसले,तरी ते 'रिपब्लिक' या ग्रंथाच्या रूपात आपल्या मनात कायम असतील आणि आहेत यात काही शंकाच नाही !


 संगीतामुळे मनाचा समतोल राहतो आणि व्यायामामुळे शरीराचा.- प्लेटो


१७ जून २०२३ या लेखमालेतील पुढील लेख.



२१/६/२३

१.२ पाश्चिमात्य वैद्यक : ग्रीस

ॲरिस्टॉटल


ॲरिस्टॉटल आणि त्याच्या सहकाऱ्यांनी ख्रिस्तपूर्व चौथ्या शतकाच्या अखेरीला शरीराच्या अभ्यासाला सुरुवात केली.ॲरिस्टॉटलच्या कल्पना गमतीशीरच होत्या.त्यानं विश्वातल्या वस्तूंची एक शिडीच बनवली होती.सर्वात खाली निर्जीव वस्तू,नंतर वनस्पती,मग वेगवेगळे प्राणी आणि शेवटी माणूस अशा त्या शिडीच्या ११ पायऱ्या होत्या.त्याच्या मते,आपण मेंदूऐवजी हृदयामुळे विचार करू शकतो आणि मेंदूचं काम रक्त थंड करणं हे असतं! त्याचा समकालीन डायोकल्स ऑफ कॅरिस्टॉस यानं प्राण्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या शरीरविच्छेदनासंबंधी एक पुस्तक लिहिलं.अशा प्रकारचं पुस्तक लिहिणारा तो पहिलाच. मग इसवीसन पूर्व २८० च्या सुमाराला हिरोफिलसनं माणसाच्या शरीराची रचना आणि त्यातल्या अवयवांविषयी अभ्यास केला.त्यानं डोळ्यांचं विच्छेदन (डिसेक्शन) केलं. त्याच काळात इरॅसिस्ट्रस या त्या काळच्या वैज्ञानिकानं मेलेल्या माणसाच्या मेंदूचं विच्छेदन केलं.माणसाची हालचाल कशी होते,तसंच त्याला वेगवेगळ्या जाणिवा आणि संवेदना कशामुळे होतात हे अभ्यासायचं होतं.त्यानं तोपर्यंत चालत आलेल्या अनेक समजांना हास्यास्पद ठरवलं.त्याच्या मते माणसाचं सगळं शरीर हे एखाद्या यंत्रासारखं चालतं आणि त्यात काही विशेष नसतं.


अथेन्स


ग्रीकांचं बायॉलॉजीचं ज्ञान आणि एकूणच विज्ञानाची प्रगती ॲरिस्टॉटलच्या काळात (ख्रिस्तपूर्व ३८४ ते ३२२) शिखरावर पोहोचली होती.स्वतः ॲरिस्टॉटल हा ग्रीक तत्त्वज्ञानाचा कळसबिंदूच होता.ॲरिस्टॉटल हा उत्तर ग्रीसमध्ये राहत होता.तो अलेक्झांडर द ग्रेट याचा गुरू होता.ॲरिस्टॉटलनं अथेन्समध्ये लायसियम नावाचं विद्यापीठ काढलं होतं.ते फारच प्रसिद्ध होतं. त्या काळी ॲरिस्टॉटल हा सगळ्यात हुशार आणि बुद्धिमान म्हणावा असा माणूस होता. त्यानं भौतिकशास्त्र,अवकाशविज्ञान,

तत्त्वज्ञान आणि बायॉलॉजी अशा जवळपास सगळ्याच विषयांवर लिहिलं.आज आपण त्याला त्यानं मांडलेल्या अवकाश विज्ञान आणि भौतिकशास्त्रातल्या मतांमुळे ओळखतो. या विषयांतली त्याची अनेक मतं आणि तत्त्वं पूर्णपणे चुकीची होती हेही आता आपल्याला माहीत आहे.तरीही त्याच्याइतका महत्त्वाचा विचारवंत त्याच्या अगोदर आणि नंतर कित्येक शतकं झाला नाही.या विश्वातल्या अनेक गोष्टींचं निरीक्षण करून त्या सगळ्यांना एकसूत्री तत्त्वात बांधणारा तो पहिलाच तार्किक विचारवंत असला पाहिजे. त्यामुळेच विज्ञान,तत्त्वज्ञान,राजकीय विचार अशा कोणत्याही विषयाचा अभ्यास करताना ॲरिस्टॉटलला वगळून आपण पुढे जाऊच शकत नाही.त्यानं आपल्याला जीवनाच्या प्रत्येक अंगाच्या खिडकीत डोकावून बघायला शिकवलं.


ख्रिस्तपूर्व ३८४ साली मॅसेडोनिया जवळ जन्मलेला ॲरिस्टॉटल हा प्लेटोचा शिष्य होता.सॉक्रेटिसचा शिष्य प्लेटो यानं सुरू केलेल्या अॅकॅडमीमध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये ॲरिस्टॉटल हा खूपच हुशार मानला जायचा. प्लेटोचा कल नैतिकतेकडे जास्त होता. निसर्गातलं सौंदर्य प्रत्यक्ष अनुभवण्यापेक्षा तो ते गणितानं मांडायचा प्रयत्न करत असे आणि इथेच ॲरिस्टॉटलचे प्लेटोबद्दल मतभेद होते. त्यामुळे प्लेटोही ॲरिस्टॉटलला आपली परंपरा चालू ठेवणारा वारस असं मानतच नसे.

त्यामुळे ॲरिस्टॉटलनं स्वत:ची 'लायसियम' नावाची अॅकॅडमी काढली. तो तिथं आपल्या शिष्यांना घेऊन फिरता फिरता गप्पा मारत मारत शिकवत असे.त्यामुळेच त्याच्या शिष्यांना पुढे 'पेरीपॅटेटिक्स' म्हणजे चालणारे किंवा फिरणारे असं म्हणायला लागले.


आपण इथं का आहोत? आपल्या अस्तित्वाला काय अर्थ आहे? या सगळ्या विश्वामागे कुठली तरी योजना असली पाहिजे वगैरे विचार त्याच्या डोक्यात घोळत.प्रत्येक गोष्टीमध्ये ही निसर्गाची योजना शोधणाऱ्या त्याच्या 'टेलिओलॉजी' या तत्त्वज्ञानाचा विज्ञानाच्या प्रगतीवर पुढची अनेक शतकं परिणाम होणार होता.ॲरिस्टॉटलनं एकूण १५० प्रबंध लिहिले त्यातले आज फक्त ३०च उपलब्ध आहेत. त्यात त्यानं तत्त्वज्ञान (फिलॉसॉफी),

नैतिकता (एथिक्स), राजकारण (पॉलिटिक्स),सौंदर्यशास्त्र (अस्थेटिक्स), भौतिकशास्त्र (फिजिक्स), खगोलशास्त्र (अस्ट्रॉनॉमी) आणि जीवशास्त्र (बायॉलॉजी) या सगळ्याच विषयांवर लिहिले.या लेखांमधून त्याचे जगाविषयीचे, विज्ञानाविषयीचे आणि अध्यात्माविषयीचे विचार कळतात. 


गंमत म्हणजे त्या काळी अध्यात्माला 'मेटॅफिजिक्स' म्हणजे फिजिक्सच्या पलीकडचं असं म्हटलं जायचं. या नावाला खरं तर काही वैज्ञानिक कारण नसून यामागचं कारण फारच मजेशीर होतं. 


ॲरिस्टॉटलच्या लायब्ररीत अध्यात्माची पुस्तकं

फिजिक्सच्या पुस्तकांच्या पलीकडे ठेवलेली असायची.

म्हणून फिजिक्सच्या पलीकडचं म्हणून फिजिक्सच्या पलीकडचं म्हणून अध्यात्माला 'मेटॅफिजिक्स' असं गमतीशीर नाव पडलं !


पण महत्त्वाची गोष्ट अशी,की ॲरिस्टॉटलनं बायॉलॉजीमध्येही खूपच काम केलं आहे.समुद्री जिवांबद्दल त्याला विशेष प्रेम होतं हे आपल्याला सांगितलं तर आश्चर्य वाटेल.त्यानं 'नॅचरल हिस्ट्री' या आपल्या पुस्तकात समुद्री जिवांबद्दलची निरीक्षणं नोंदवली आहेत.योग्य,सुसंबद्ध आणि व्यवस्थित निरीक्षणं करून त्यानं चक्क ५०० प्रकारच्या प्राण्यांची नोंद केली होती! ॲरिस्टॉटलनं लिहिलेली बायॉलॉजीबद्दलची पुस्तकं ही त्यानं लिहिलेल्या पुस्तकांमधली सगळ्यात सुंदर, सुसंगत आणि वैज्ञानिकदृष्ट्या बरोबर होती.


माशांप्रमाणेच समुद्रात राहात असूनही डॉल्फिन हे सस्तन प्राणी आहे विचार ॲरिस्टॉटलनंच पहिल्यांदा मांडला होता हे पाहिलं की आश्चर्य वाटतं.


बायॉलॉजीचा अभ्यास करताना निसर्गातल्या वेगवेगळ्या प्राण्यांच्या रचना वेगवेगळ्या प्रमाणात क्लिष्ट किंवा गुंतागुंतीच्या असतात असं त्याच्या लक्षात आलं होतं.

त्यामुळे साधी रचना असलेले प्राणी जीवनाच्या सर्वात खालच्या पायरीवर असावेत आणि अधिकाधिक विकसित होत गेलेले प्राणी वरच्या पायऱ्यांवर असावेत असं त्याला वाटत होतं.त्यानं या कल्पनेला 'जीवनाची शिडी' असं म्हटलं होतं. पण तरीही इतक्या जवळ पोहोचूनही कोणत्याही प्रगत प्राण्याची जात आधीच्या कमी विकसित प्राण्यापासून उदयाला येत असावी का हा विचार त्याच्या मनात दूरवरही डोकावला नव्हता हे विशेष! अर्थात,ही संकल्पना उत्क्रांतिवादात येते. पण तरी ॲरिस्टॉटलच्या या कामामुळे त्यानं झूऑलॉजी (प्राणिशास्त्र) या बायॉलॉजीच्या शाखेचा पाया रचला हे नक्की.त्यामुळेच ॲरिस्टॉटलला 'फादर ऑफ झूऑलॉजी' म्हणतात.


आपल्या सभोवती इतक्या वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी आहेत की सगळ्यांची नोंद आणि माहिती ठेवणं आपल्या आवाक्यातलं काम नाही असं त्याला वाटलं होतं.पण तरीही प्राण्यांचे वेगवेगळे गट पाडले पाहिजेत आणि त्यांची गटवार नोंदणी व्हायला हवी असा अगदी नवीनच विचार ॲरिस्टॉटलनं त्याच वेळी मांडून ठेवला होता हे विशेष! अर्थात, ही कल्पना जरी खूपच महत्त्वाची होती तरी हे काम प्रचंड अवघड होतं. या कल्पनेमुळे ॲरिस्टॉटल आपल्या काळापेक्षा जवळपास २००० वर्ष पुढे होता.त्यामुळेच हे काम करायला पुढे अठराव्या शतकात कार्ल लिनियस हा बॉटनिस्ट जन्म घेणार होता.


अजून तर बॉटनी या बायॉलॉजीच्या शाखेचाही उगम झाला नव्हता.बॉटनीची कल्पना मात्र याच काळातला थिओफ्रॉस्ट्स हा ॲरिस्टॉटलचाच विद्यार्थी मांडणार होता.कारण ॲरिस्टॉटलनं जरी प्राण्यांबद्दल काम केलं होतं तरी त्यानं वनस्पतींकडे फारसं लक्ष दिल नाही असं दिसतं.


ॲरिस्टॉटलच्या मृत्यूनंतर त्यानं स्थापन केलेल्या विद्यापीठाची धुरा त्याचाच शिष्य थिओफ्रॉस्ट्स (ख्रिस्तपूर्व ३७१ ते २८७) याच्या खांद्यावर आली.

थिओफ्रॉस्ट्सन लायसियम विद्यापीठाची जबाबदारी तर व्यवस्थित पार पाडलीच,पण त्यानं बॉटनी या बायॉलॉजीच्या शाखेचाही पाया घातला.त्यानं जवळपास ५०० वनस्पतींची काळजीपूर्वक निरीक्षणं करून त्यांची नोंद केली होती.


थिओफ्रॉस्ट्स हे त्याचं खरं नाव नव्हतं.त्याचं खरं नाव हे टायरॅट्मस होतं.पण टायरॅट्मस जेव्हा एखाद्या गोष्टीबद्दल बोलायला लागायचा तेव्हा सगळे मंत्रमुग्ध होऊन ऐकत राहायचे,इतक्या रसाळपणे तो एखादा विषय मांडायचा. त्याच्या याच गुणामुळे ॲरिस्टॉटलनं त्याचं नाव थिओफ्रॉस्ट्स म्हणजे ग्रीकमध्ये 'वाणीची रसाळता' असं ठेवलं होतं.ॲरिस्टॉटलचा तो आवडता शिष्य होता.त्याची आकलनक्षमता आणि ग्रहणक्षमता खूपच चांगली होती.त्यामुळे लायसियममध्ये आल्यानंतर काहीच काळात ॲरिस्टॉटलनं त्याला आपल्या लेखनकार्यात सामावून घेतलं.


त्यावेळच्या प्रथेप्रमाणे थिओफ्रॉस्ट्सनं तत्त्वज्ञान, भाषा,व्याकरण,भौतिकशास्त्र आणि एथिक्स याही विषयांमध्ये प्रावीण्य मिळवलं होतं. तरीही त्याला वनस्पतींबद्दल जास्त आकर्षण होतं असं त्याच्या अभ्यासावरून लक्षात येतं. 


लायसियममध्ये असताना ॲरिस्टॉटलनं प्राण्यांवर अभ्यास केला आणि त्याच वेळी थिओफ्रॉस्ट्सनं वनस्पतींचा अभ्यास केला अशा नोंदी आहेत. याच काळात साधारणपणे ख्रिस्तपूर्व ३३५ मध्ये ॲरिस्टॉटल जेव्हा अलेक्झांडरला शिकवायला अलेक्झांड्रियामध्ये गेला,तेव्हा थिओफ्रॉस्ट्सही त्याच्या सोबत होता.


थिओफ्रॉस्ट्सनं त्यावेळच्या प्रचलित विषयांवर तर लिहिलंच,पण त्याच्या लिखाणाचा मुख्य हेतू हा ॲरिस्टॉटलनं सुरू केलेलं नॅचरल सायन्सवरचं लिखाण पुढे नेणं हा होता.त्यानं लिहिलेल्या पुस्तकांपैकी 


'हिस्टोरिया प्लँटारम' म्हणजेच 'द एन्क्वायरी इनटू प्लँट्स' आणि 'ऑन द कॉजेस ऑफ प्लँट्स' या वनस्पतींवरच्या दोन पुस्तकांनी वनस्पतिशास्त्राचा पायाच रचला. यामुळेच थिओफ्रॉस्ट्सला वनस्पतिशास्त्र म्हणजे 'बॉटनीचा पितामह' म्हटलं जातं.


थिओफ्रॉस्ट्सनं लिहिलेल्या 'द एन्क्वायरी इनटू प्लँट्स' या पुस्तकाचे तर दहा खंड होते.त्यात त्यानं त्याला आढळलेल्या जवळपास सगळ्याच वनस्पतींची त्यांचे उपयोग,खाण्यायोग्य वनस्पती, त्या आढळणारी ठिकाणं,

त्यांचा आकार,त्यांच्या पानाफुलांची रचना अशा जवळपास सगळ्याच अंगांनी निरीक्षणं आणि अभ्यास करून वर्णनं लिहिली होती.पहिल्या पुस्तकात झाडांच्या अवयवांबद्दल लिहिलं आहे,दुसऱ्या प्रकरणात झाडांच्या पुनरुत्पादनाबद्दल लिहिलं आहे. तिसऱ्या,चौथ्या आणि पाचव्या पुस्तकांत त्या झाडांची इतर वैशिष्ट्यं आणि त्यांचे उपयोग लिहिलेले आहेत.सहाव्या पुस्तकांत लहान झुडपांबद्दल (श्रब्ज) लिहिलं आहे.सातव्या पुस्तकात खाण्यायोग्य बियांच्या झाडांबद्दल लिहिलं आहे.आठव्या पुस्तकात डिंक,रबर, ताडी,चीक असे वेगवेगळे स्राव तयार करणाऱ्या झाडांबद्दल लिहिलं आहे.


'ऑन द कॉझेस ऑफ प्लॅट' हे पुस्तक खरं तर आठ खंडांचं होतं.पण त्याचे आता सहाच खंड उपलब्ध आहेत.या खंडांमध्ये वेगवेगळ्या वनस्पतींची लागवड कशी करावी याचं सविस्तर वर्णन त्यानं लिहून ठेवलं आहे.गंमत म्हणजे झाडांची पानं,फुलं,फळं यांच्या वासांबद्दलही त्यानं चक्क एक पुस्तक लिहिलं आहे.


झाडांच्या योग्य वाढीसाठी वातावरण आणि माती हे घटक महत्त्वाची भूमिका बजावतात हे त्यानं ओळखलं होतं.त्यानं काही वनस्पतींना नावंही दिली.त्यामुळेच बॉटनीमध्ये काही वेळा झाडांच्या नावांच्या उल्लेखानंतर थिओफर (Theophr) असा त्याच्या नावाचं संक्षिप्त रूपही लिहिलेलं पाहायला मिळतं.गंमत म्हणजे नावाचं असं संक्षिप्त रूप (L) लिनियसनं दिलेल्या नावांमागेही दिसून येतं


अलेक्झांड्रिया


अलेक्झांडर द ग्रेट यानं पर्शियन राज्य जिंकून घेतल्यानंतर संपूर्ण मेडिटेरियन भागात ग्रीक संस्कृती वेगानं पसरली.

अलेक्झांडरचेच पाईक (फॉलोअर्स) असलेल्या टॉलेमीच्या अखत्यारित इजिप्त आलं. त्यानंतर नव्यानंच वसलेल्या अलेक्झांड्रियात ग्रीकांचे घोळके स्थलांतरित व्हायला लागले.अलेक्झांड्रिया हे लवकरच शिक्षणाच आणि संशोधनाचं केंद्र बनलं.तिथे मोठं म्युझियम (वस्तुसंग्रहालय) बांधलं गेलं. अलेक्झांड्रियाच्या विद्यार्थ्यांची लवकरच हुशार गणिती,अवकाशविज्ञान,

भूगोल आणि भौतिकशास्त्रज्ञ म्हणून ख्याती पसरायला लागली.याही ठिकाणी ख्रिस्तपूर्व ३०० मध्ये हिरोफिलस आणि ख्रिस्तपूर्व २५० मध्ये हिरोफिलसचाच शिष्य इरॅसिस्ट्स हे दोन महत्त्वाचे बायॉलॉजिस्ट्स होऊन गेले.


त्या काळी बायॉलॉजी,फिजिऑलॉजी किंवा ॲनॅटॉमी शिकण्यासाठी मानवी शरीराचं विच्छेदन करणं हा ख्रिश्चन धर्मानुसार दखलपात्र गुन्हा होता.त्यामुळे बायॉलॉजिस्टना असा अभ्यास करण्यावर खूपच बंधनं होती.पण या लोकांनी उघडपणे नाही,पण आपल्या खासगी (प्रायव्हेट ) प्रयोगशाळेत मानवी प्रेतं मिळवून यावर नक्कीच अभ्यास केला होता. हिरोफिलसनं मानवी मेंदूवर बराच अभ्यास केला होता.माणसाच्या मेंदूकडे लक्ष देणारा हिरोफिलस हा पहिलाच वैज्ञानिक होता. माणसाची बुद्धी ही माणसाच्या मेंदूत असते अशी थिअरीच त्यानं ठामपणे मांडली होती. याआधी अल्केमॉन आणि हिप्पोक्रॅट्स हेही मेंदू हा बुद्धीला कारणीभूत असतो असं मानत होते. पण ॲरिस्टॉटल मात्र मेंदू हा शरीरातली उष्णता कमी करतो असं म्हणत होता.हिरोफिलसनं तर आपल्या शरीरातल्या इतर अवयवांकडून मेंदूकडे जाणाऱ्या सेन्सरी आणि मोटर नर्व्हज शोधल्या होत्या! त्यानं लिव्हर,स्प्लीन आणि डोळ्यांतला रेटिनाही पाहिला होता.त्यानं ओव्हरीज आणि प्रोस्टेट ग्लँड्स यांचंही वर्णन करून ठेवलं होतं. पुढे इरॅसिस्ट्रसनं मानवी मेंदूचे सेरेब्रम आणि सेरेबेलम असे दोन भाग असतात हेही निरीक्षण करून नोंदवून ठेवलं होतं.याशिवाय माणसाच्या मेंदूवर प्राण्याच्या मेंदूपेक्षा जास्त सुरकुत्या असतात हेही त्यानं पाहिलं होतं.त्यामुळेच माणूस इतर प्राण्यांपेक्षा जास्त हुशार असावा असा तर्कही त्यानं केला होता.


हिरोफिलसनं आपला शिष्य इरॅसिस्ट्रस याच्यासोबत अलेक्झांड्रियामध्ये स्कूल ऑफ ॲनॅटॉमीची स्थापना केली.प्लिनीच्या मते तर इरॅसिस्ट्रस हा ॲरिस्टॉटलच्या मुलीचा मुलगा म्हणजे ॲरिस्टॉटलचा चक्क नातू होता! आणि तिथे हिरोफिलस आणि इरॅसिस्ट्रस या दोघांनी मिळून ॲनॅटॉमीवर बरंच संशोधन केलं.प्राण्यांचं डिसेक्शन करणारा इरॅसिस्ट्रस हा पहिलाच मानावा लागेल.त्यानंच पहिल्यांदा प्राण्याच्या शरीरातल्या धमन्या आणि शिरा यांच्यातला फरक ओळखला.पण धमन्यांमध्ये हवा भरलेली असते असं तो मानत होता.शिवाय,

शरीरातल्या न्यूमावरही त्याचा विश्वास होता.पण अशा

प्रकारे प्राण्यांचं आणि कधीकधी माणसांचं डिसेक्शन केल्याबद्दल हिरोफिलस आणि इरॅसिस्ट्स यांना ख्रिश्चन धार्मिक लोकांच्या रोषालाही सामोरं जावं लागलं होतं.


इरॅसिस्ट्रसच्या खासगी आयुष्याबद्दल फारच कमी माहिती मिळते.पण त्याच्याबद्दल एक आख्यायिका फारच प्रसिद्ध आहे.


इरॅसिस्ट्रस हा सिलेयुकस राजाच्या दरबारात वैद्य होता. त्याची पहिली पत्नी वारल्यानं त्यानं स्ट्राटोनिस नावाच्या सुंदर महिलेशी लग्न केलं. तिच्यापासून त्याला एक मुलगीही झाली.एकदा या सिलेयुकस राजाचा पहिल्या राणीपासून झालेला मोठा मुलगा अँटिओचस फारच आजारी पडला.दिवसेंदिवस त्याची तब्येत ढासळायला लागली.नंतर तर त्यानं स्वतः ला सगळ्यांपासून दूर एकांतवासातच बंदिस्त करून घेतलं.त्यामुळे राजानं इरॅसिस्ट्रसला पाचारण केलं. 


इरॅसिस्ट्रसलाही अँटिओचसला नेमकं काय झालंय ते कळेना.नंतर स्ट्राटोनिस जेव्हा अँटिओचसच्या जवळ जाऊन त्याची विचारपूस करते तेव्हा अँटिओचसचं हृदय जोरात धडधडतं, त्याला कापरं भरतं,त्याचा वर्ण लाल होतो हे इरॅसिस्ट्रसनं ताडलं.त्यानंतर त्यानं याबद्दल अँटिओचसला विचारल्यावर आपण आपल्याच सावत्र आईच्या प्रेमात पडलो असल्याची कबुली त्यानं इरॅसिस्ट्रसपाशी दिली.आणि बापाच्या भीतीनं आपण आपल्या प्रेमाबद्दल कुणालाही न सांगता असं एका खोलीत स्वतःला बंद करून संपून जाण्याचा निर्णय घेतला असल्याचंही त्यानं कबूल केलं.आता इरॅसिस्ट्रसपुढे पेच उभा राहिला.अँटिओचसचं डायग्नोसिस होत नाही असं म्हटलं तर खोटं बोलल्यासारखं होईल आणि स्वतःच्या डोळ्यांदेखत तरुण उमद्या अँटिओचसला प्रेमात झुरून मरताना पाहावं लागेल.आणि खरं सांगावं तर राजा आपल्याला मृत्युदंडही द्यायला मागेपुढे पाहणार नाही. मग त्यानं सांगितलं,की अँटिओचस आपल्याच म्हणजे इरॅसिस्ट्रसच्याच बायकोच्या प्रेमात पडलाय झालं! मग राजा इरॅसिस्ट्रसला आपली बायको अँटिओचसला देऊन टाक असं म्हणत त्याच्या मागेच लागला.यावर इरॅसिस्ट्स म्हणाला, "अशी माझी बायको कशी काय मी दुसऱ्या कुणाला देऊन टाकू? महाराज,माझ्या जागी तुम्ही असला असता तर तुम्ही काय केलं असतं? तुम्ही तुमची बायको दिली असती का ?" यावर सिलेयुकस म्हणाला, "होय तर, मी माझी बायको नक्कीच दिली असती."आता इरॅसिस्ट्रस तत्काळ उत्तरला,"महाराज, देऊन टाका मग तुमची

बायको.तुमचा मुलगा तुमच्याच बायकोच्या प्रेमात पडला आहे !" यावर आपला शब्द राखणाऱ्या सिलेयुकसनं आपली सौंदर्यवती बायको आणि शिवाय काही राज्य आपल्या प्रिय मुलाला देऊन टाकलं आणि इरॅसिस्ट्रसच्या मुत्सद्दीपणाबद्दल त्यालाही भरभक्कम मानधन दिलं !


बायॉलॉजीच्या अभ्यासाची इतकी चांगली सुरुवात झाल्यानंतर मात्र अलेक्झांड्रिया विद्यापीठातल्या अभ्यासानं वेगळंच वळण घेतलं.आता इथे विज्ञानापेक्षा एथिक्स,मॉरल फिलॉसॉफी आणि व्हेटोरिक अभ्यासच जास्त व्हायला लागले.शिवाय आता रोमनांचं राज्यही आलं होतं.या सगळ्यात मध्ये मध्ये युद्ध आणि लढाया यांचीही धुमश्चक्री चालायची.त्यामुळे आयोनियन्समध्ये सुरू झालेली आणि जवळपास चार शतकं चाललेली ही परंपरा लयाला जायला लागली होती.


यामध्ये बायॉलॉजी या विषयाचं बरंचसं नुकसान झालं.काही धर्मामध्ये मानवी शरीर हे देवाची निर्मिती असल्यामुळे ते पवित्र असतं अशीही धारणा होती.त्यामुळे माणसाला त्याची चिरफाड करण्याचा काही अधिकार नाही असा विचार वर येत होता.तर काही धर्मांमध्ये मृत्यूनंतरचं जीवन जगण्यासाठी माणसाला त्याच्या शरीराची आवश्यकता असते,नाहीतर त्याचा आत्मा भरकटून जाईल अशी समजूत असल्यानं मृत शरीरांची चिरफाड न करता ती तशीच जपून ठेवली पाहिजेत असा विचार होता.थोडक्यात, माणसानं प्राण्यांच्या किंवा माणसांच्या शरीराची चिरफाड करणं हे आताच्या तत्त्वात न बसल्यामुळे कायद्यानं यावर बंदी घातली गेली. त्यामुळे बायॉलॉजीची प्रगतीच खुंटली होती.


१० जून २०२३ या लेखमालेतील पुढील भाग..



१९/६/२३

सत्याचे प्रयोग - मोहनदास करमचंद गांधी (१९२७)

आयफेल टॉवर म्हणजे प्रदर्शनातलं एक मोठं खेळणं असल्याप्रमाणे लोक वरपर्यंत चढून तो पाहत होती.

जोपर्यंत आपण मोहाला बळी पडतो,तोपर्यंत आपण एक लहान मूलच आहोत आणि याचं उत्तम उदाहरण म्हणजे आयफेल टॉवर,असं गांधीजींनी 'सत्याचे प्रयोग' या पुस्तकात म्हणून ठेवलंय.


दक्षिण आफ्रिकेत असताना गांधीजींनी शिक्षणातल्या आपल्या प्रयोगांमुळे फक्त मोठ्या मुलाला अहमदाबादच्या हायस्कूलमध्ये शिक्षणासाठी ठेवलं;पण बाकी मुलांना शाळेत न पाठवता घरीच शिक्षण देण्याचा प्रयत्न केला. गांधीजींच्या शिकवण्यात नियमितपणा नसायचा. आपण मुलांना पुस्तकी शिक्षण देऊ शकलो नाही,असं गांधीजींनी म्हटलं आहे.त्यामुळे मुलांच्या आपल्या बाबतीत नेहमीच तक्रारी राहिल्या.याचं कारण इतर शिकलेल्या मुलांची आणि त्यांची भेट होत असे,त्या वेळी आपण शाळेत न गेल्याचं,कुठलीच पदवी नसल्याचं दुःख मुलांना सतावत असे.असं असलं तरीही आपल्या मुलांना अनुभवाच्या शाळेतलं शिक्षण मिळालं,असं गांधीजी म्हणतात.


तसंच त्यांना आपल्या आई- वडिलांचा सहवास मिळाला. साधेपणा आणि सेवाभाव कृत्रिम शिक्षणातून त्यांच्यामध्ये रुजला नसता.या सगळ्या गोष्टींचा पश्चात्ताप आपल्याला जराही होत नाही,असंही गांधीजींनी लिहून ठेवलंय.


गांधीजींच्या अनेक मित्रांनी त्यांना,'तुम्ही आपल्या मुलांना शिक्षण न देऊन त्यांचे पंख छाटले,त्यांना बॅरिस्टर वगैरे पदव्या मिळाल्या असत्या तर तुमचं काय बिघडलं असतं,

त्यांना त्यांच्या आवडीनुसार आयुष्याचा मार्ग ठरवण्याच्या स्थितीपर्यंत त्यांना का येऊ दिलं नाही,असं वागणं हे तुमच्या अभिमानाचं आणि अज्ञानाच फळ आहे'अशी टीकाही आपल्या मित्रांनी आपल्यावर केली, असं गांधीजींनी म्हटलं.


'पहिल्या पाच वर्षांत मूल जेवढं शिकत तेवढं पुढल्या सबंध आयुष्यात शिकू शकणार नाही. मुलाचं खरं शिक्षण आईच्या पोटात असल्यापासूनच सुरू होतं.आईची गरोदर असतानाची प्रकृती,तिचा त्या काळातला आहार-विहार,या सगळ्यांचा वारसा घेऊन मूल जन्म घेतं आणि पुढली अनेक वर्षं ते आपल्या आई-वडिलांचं अनुकरणही करतं.

रतिसुखाला एक स्वतंत्र वस्तू समजणं म्हणजे अज्ञान असून जननक्रियेवर जगाचं अस्तित्व अवलंबून आहे,' असंही त्याच वेळी गांधीजींनी म्हटलं.


आफ्रिकेतून भारतात परत येण्याच्या वेळी गांधीजींना अनेक भेटवस्तू मिळाल्या. कस्तुरबांनाही पन्नास गिनींचा हार मिळाला.या सगळ्या भेटवस्तू मौल्यवान होत्या.त्या भारतात घेऊन जायच्या की नाही याबाबतीत गांधीजींच्या मनात संभ्रम तयार झाला.आपण या मौल्यवान वस्तू आणि दागिने यांचा ट्रस्ट करायचा त्यांचा इरादा होता.

मुलांची समजूत गांधीजी घालू शकले.मात्र या गोष्टीसाठी कस्तुरबा अजिबात तयार झाल्या नाहीत.या वस्तूंची मुलांना आवश्यकता भासत नसली,मलाही भासत नसली तरी पुढे आपल्या येणाऱ्या सुनांसाठी या वस्तू गरजेच्या आहेत.असं कस्तुरबांचं म्हणणं होतं.या वस्तू गांधीजींमुळे जरी मिळाल्या असल्या तरी त्यांच्या प्रत्येक कामात आपण रात्रंदिवस राबलो आहोत,असं कस्तुरबांचं म्हणणं होतं.अखेर गांधीजींनी कस्तुरबांना राजी करून एक ट्रस्ट ट्रस्ट केला.आणि सार्वजनिक कामासाठी त्यांचा उपयोग व्हावा असं ठरवलं. त्यांना आपल्या या कृत्याचा कधीही पश्चात्ताप झाला नाही.सामाजिक कार्यकर्त्याला अशा भेटवस्तू मिळाल्या तरी त्यानं त्या घेऊ नयेत,असं मत गांधीजींनी 'सत्याचे प्रयोग' या पुस्तकात व्यक्त केलं आहे.


१९०१ साली काँग्रेसची महासभा कलकत्त्याला असणार होती. त्यात सहभागी होऊन बोलण्यासाठी गांधीजीही गेले होते.त्या वेळी तिथली घाण,पाणी आणि दुर्गंधी बघून गांधीजींच्या अंगावर शहारे आले.त्यांनी तिथल्या स्वयंसेवकांना ती घाण दाखवली आणि ती साफ करायला सांगितली तेव्हा त्यांनी आपले खांदे उडवत ते काम भंग्यांचं आहे,असं सांगितलं.त्या वेळी गांधीजींनी स्वतः केरसुणी घेऊन घाण साफ केली;पण त्या वेळी इतरांना मात्र त्या घाणीविषयी काहीही वाटत नव्हतं ही गोष्ट गांधीजींच्या लक्षात आली.


गांधीजींनी कलकत्ता ते राजकोट प्रवास केला, तेव्हा ते काशीलाही थांबले.तिसऱ्या वर्गाच्या डब्याने प्रवास केल्यामुळे डब्यातल्या शौचालयाची अवस्था अत्यंत वाईट होती. लोकांनी वाट्टेल तिथे थुंकून,कचरा टाकून,बिड्या ओढून,तंबाखू खाऊन पिचकाऱ्या मारणं अशी घाण केलेली होती.डब्यातले लोक मोठमोठ्याने बोलत होते.काशीत उतरल्यावर एका पंड्याच्या घरी गांधीजींनी राहायचं ठरवलं.काशी विश्वनाथाच्या दर्शनाला गेल्यावर तिथली स्थिती पाहून गांधीजींना खूपच वाईट वाटलं.अरुंद अशा घसरड्या गल्ल्यांमधून त्यांना जावं लागलं. माश्यांनी उच्छाद मांडलेला होता.दुकानदारांची कलकल अखंड चालू होती.ज्या ठिकाणी परमेश्वराचं दर्शन घेण्यासाठी ध्यान लावायचं तिथे अशी परिस्थिती पाहून गांधीजी खंतावले. तिथली लबाडी,कुजलेल्या निर्माल्याची दुर्गंधी, सगळं बघून गांधीजींना तिथे दक्षिणा ठेवावीशी वाटेना.

तरीही त्यांनी एक पै ठेवली तेव्हा तिथल्या पंड्यानं गांधीजींना शिव्याशाप द्यायला सुरुवात केली.त्यानंतरही गांधीजी काशीला दोन वेळा गेले,पण तिथली परिस्थिती मात्र 'जैसे थे' च असल्याचं त्यांना अनुभवायला मिळाली.


'क्रिटिक'चा उपसंपादक मि.पोलाक आणि गांधीजी यांची ओळख झाली आणि त्यांनी 'अन्टू धिस लास्ट' हे रस्किनचं पुस्तक गांधीजींना भेट दिलं.त्या पुस्तकानं गांधीजींवर मोठा प्रभाव टाकला.या पुस्तकाचं गांधीजींनी पुढे 'सर्वोदय' या नावानं भाषांतरही केलं.आपल्यामध्ये असलेल्या गोष्टी त्यांना रस्किनच्या पुस्तकात सापडल्या.त्या पुस्तकात म्हटलं होतं, 'सर्वांच्या कल्याणात आपलं कल्याण आहे. वकील असो की न्हावी,दोघांच्याही कष्टाची किंमत एकसारखी असायला हवी.अंगमेहनतीचं शेतकऱ्याचं जगणं हेच खरं जगणं'अशा प्रकारच्या पुस्तकातल्या सिद्धांतांनी गांधीजींना आपल्या कामाची दिशा स्पष्ट झाली आणि त्यातूनच त्यांनी फिनिक्स आश्रमाची स्थापना केली.या आश्रमात त्यांच्या हाकेला साद देत मि.पोलाकदेखील आले आणि ते त्या आश्रमात रमले.


गांधीजींनी 'सत्याचे प्रयोग' त्या आत्मकथेत आश्रमातले अनेक प्रसंग,खादी आणि त्या अनुषंगानं चरख्याचा शोध,

सत्याग्रह,अहिंसेची ताकद,स्वतःचे सहकारी याबद्दल खूप आत्मीयतेनं लिहिलं आहे.तसंच 'नवजीवन' आणि 'यंग इंडिया' या साप्ताहिकांविषयीदेखील एक प्रकरण यात आहे.१९२१ नंतर गांधीजींचं संपूर्ण जगणं हे सार्वजनिक झालं.त्यामुळे आपली कुठलीही कृती कोणाला ठाऊक नाही, असं झालं नाही,असं त्यांनी म्हटलं आणि आपलं आत्मकथेचं लिखाण इथंच थांबवलं.


गांधीजींनी जेव्हा पुणे शहराला भेट दिली,तेव्हा ते लोकमान्य टिळकांना भेटले,तसंच रामकृष्ण भांडारकर,

गोपाळ कृष्ण गोखले आणि सर फिरोजशहा यांनाही भेटले.'सर फिरोजशहा मला हिमालयासारखे वाटले;

लोकमान्य समुद्रासारखे वाटले,गोपाळ कृष्ण गोखले गंगेसारखे वाटले. तिच्यात स्नान करता येण्यासारखं होतं,पण हिमालय चढून जाणं अशक्य होतं,तसंच समुद्रात बुडण्याची धास्ती जास्त असते;पण गंगेच्या मांडीवर खुशाल खेळावं,तिच्यावर होडी खेळवावी,'असं गांधीजींनी पुण्याच्या भेटीबद्दल म्हणून ठेवलंय.


१९०६ सालापासून गांधीजींनी ब्रह्मचर्य पालन करायला सुरुवात केली.सुरुवातीचे त्यांचे अनेक प्रयत्न असफल झाले.आपल्या पत्नीशी चर्चा करून,तिची संमती घेऊनच त्यांनी ब्रह्मचर्यपालनाचा निर्धार केला.


आपल्या वासनांवर नियंत्रण मिळवण्यात गांधीजी यशस्वी झाले.या प्रयोगात मसाल्याशिवायचा साधा माफक नैसर्गिक स्वरूपातला आहार गांधीजींनी घ्यायला सुरुवात केली.आपल्या इंद्रियांचं दमन करण्यासाठी त्यांनी उपवासाचेही प्रयोग केले.उपवास करत असलेली व्यक्ती विचारानं मात्र पंचपक्वान्न चाखत असेल तर त्या उपवासाला काहीच अर्थ नाही.त्यामुळे उपवास करताना विरक्तीची भावना मनात निर्माण व्हायला हवी.

ब्रह्मचर्यपालनात उपवास अत्यंत महत्त्वाचा भाग असल्याचं गांधीजींनी म्हटलं.


'सत्याचे प्रयोग' या गांधीजींच्या आत्मकथेत तीन प्रकरणं गोपाळ गोखलेंच्या सहवासातल्या काळातले आहेत.

गांधीजी गोपाळ कृष्ण यांना खूपच मानत.त्यांनीही गांधीजींना आपला सख्खा धाकटा भाऊ असावा अशी वागणूक दिली. गांधीजींचं स्वावलंबन,उद्यमशीलता, नियमितपणा यांचा प्रभाव गोखलेंवरही पडला होता.

गोखले आपल्या कामाचा एक क्षणही वाया घालवत नसत.त्यांचं संपूर्ण जगणं हे देशकार्यासाठीच वाहिलेलं होतं.त्यांच्या बोलण्यात कधीच अहंकार,दंभ,खोटेपणा गांधीजींना आढळला नाही.भारताचं पारतंत्र्य आणि गरिबी या दोन गोष्टी त्यांना सतत डाचत असत.गोखलेंना रानडेंबद्दल खूप आदर होता. त्यांच्या बोलण्यातून ते सतत 'रानडे असे म्हणत...' असं बोलून पुढे वाक्याची सुरुवात करत असत.


'सत्याचे प्रयोग' याशिवाय गांधीजींनी अनेक पुस्तकं लिहिली.त्यांनी दक्षिण आफ्रिकेतल्या त्यांच्या संघर्षावर 'दक्षिण आफ्रिकेतील सत्याग्रह','हिंद स्वराज','गांधी विचार दर्शन: अहिंसा विचार','गांधी विचार दर्शन:राजकारण', 'गांधी विचार दर्शन: अहिंसा विचार,'गांधी विचार दर्शन : सत्याग्रह प्रयोग,' 'गांधी विचार दर्शन:,सत्याग्रहाची जन्मकथा','गांधी विचार दर्शन: हरिजन','नैतिक धर्म' आणि 'माझ्या स्वप्नांचा भारत' इतकं लिखाण केलं.


जॉन  रस्किनच्या 'अनटू धिस लास्ट' या पुस्तकाच त्यांनी गुजराती भाषेत भाषांतरही केलं.त्यांनी अर्थशास्त्र,

शाकाहार,आहार आणि स्वास्थ्य,धर्म,सामाजिक परिवर्तन अशा अनेक विषयांवर विपुल लेखन केलं. गांधीजी प्रामुख्यानं गुजरातीमध्ये लिखाण करत,पण त्याबरोबरच हिंदी आणि इंग्रजी भाषांतरित पुस्तकांचं परीक्षणही करत असत.गांधीजीच पूर्ण लिखाण भारत सरकारनं 'संकलित महात्मा गांधी' या नावानं प्रकाशित केलं असून त्याचे जवळजवळ १०० खंड आणि ५० हजार पृष्ठसंख्या आहे.गांधीजींवरही अनेकांनी पुस्तकं लिहिली,त्यात दुई फिशरनं लिहिलेलं 'महात्मा गांधी',तुषार गांधी लिखित 'लेट अस किल गांधी',थॉमस वेबर लिखित 'गांधी',

प्यारेलाल आणि सुशिल नैय्यर लिखित 'महात्मा गांधी',वि. स.खांडेकर लिखित 'दुसरे प्रॉमिथियस : महात्मा गांधी',

प्रमोद कपूर लिखित 'गांधी',नारायणभाई देसाई लिखित 'अज्ञात गांधी' आणि रावसाहेब कसबे लिखित 'गांधी : पराभूत राजकारणी, विजयी महात्मा' ही पुस्तकं विशेष उल्लेखनीय आहेत.


ब्रिटिश चित्रपट दिग्दर्शक सर रिचर्ड अॅटनबरो यानं गांधीजींच्या आयुष्यावर १९८१ साली इंग्रजी चित्रपट प्रदर्शित केला.या चित्रपटानं आठ ऑस्कर पुरस्कार जिंकून एक विक्रम नोंदवला होता.हिंदीसह जगातल्या बहुतांश भाषांमध्ये या चित्रपटाचं भाषांतर झालं.या चित्रपटात बेन किंग्जले या ब्रिटिश अभिनेत्यानं गांधीजींची भूमिका प्रभावीपणे साकारली होती. तसंच हा चित्रपट अत्यंत यशस्वी चित्रपट म्हणून ओळखला जातो.

२००६ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'लगे रहो मुन्नाभाई' या चित्रपटात दिलीप प्रभावळकर यांनी गांधीजींची भूमिका अतिशय अप्रतिमरीत्या साकारली होती.शफाअत खानचं 'गांधी आडवा येतो' हे नाटकही खूपच गाजलं. याशिवाय 'हे राम','गांधी विरुद्ध गांधी','मोहन से महात्मा'सह अनेक चित्रपट आणि नाटकं गांधींच्या व्यक्तिरेखेवर बेतलेली आहेत. गांधीविचारांवर आधारितदेखील अनेक चित्रपटांची निर्मिती झाली आहे.


१९३० साली 'टाइम' या नियत कालिकानं गांधीजींना 'मॅन ऑफ द इयर' म्हणून सन्मानित केलं.३० जानेवारी १९४८ या दिवशी नथुराम गोडसे यानं आपल्या सहकाऱ्यांसमवेत गांधीजींवर गोळ्या झाडल्या आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला.


गांधीजी म्हणत,'तुम्ही मला कैद करू शकता,माझा छळ करू शकता,माझं शरीर नष्ट करू शकता,पण माझ्या मनाला कधीच कैद करू शकणार नाहीत.' 'जग बदलायचं असेल तर आधी स्वत:ला बदला,'असं त्यांचं म्हणणं होतं.गांधीजींचा प्रभाव जगभर कालही होता,आजही आहे आणि उद्याही राहील.


 २००० साली प्रभाव टाकणाऱ्या व्यक्तींचं सर्वेक्षण करण्यात आलं,तेव्हा साहित्यिक ,नेते,शास्त्रज्ञ,

कलाकार अशा सगळ्यांना मागे टाकत दोन व्यक्तींना जास्त मतं पडली.पहिली व्यक्ती होती,जगविख्यात शास्त्रज्ञ अल्बर्ट आईन्स्टाइन आणि दुसरी व्यक्ती होती महात्मा गांधी!


'इतिहासाच्या पानावर गांधीजींचं नाव ख्रिस्त आणि बुद्ध यांच्या बरोबरीनं लिहिलं जाईल,' असं व्हॉइसरॉय लॉर्ड माऊंटबेटन यांनी म्हटलं होतं.गांधीजींचं नाव जगभरात अढळपणे कोरलं गेलंच,पण त्याचबरोबर २० व्या शतकातलं १०० पुस्तकांमधलं 'सत्याचे प्रयोग' हे गांधीजींचं पुस्तक सर्वोत्कृष्ट प्रेरणादायी पुस्तक म्हणून ओळखलं जातं.!


प्रत्येक माणसाची गरज भागवण्यासाठी पृथ्वी सक्षम आहे,पण त्याची हाव भागवण्यासाठी नाही.- महात्मा गांधी


१६ जून २०२३ या लेखातील शेवटचा भाग..