* विजय गायकवाड | Vijay Gaikawad: नोव्हेंबर 2022

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

३०/११/२२

मानवी भावनिक हाकेला संवेदनशील ओ देणारा ' व्यवस्थेचा बइल '

रोज सकाळी आपलं नैसर्गिक घड्याळ सेट करण्यासाठी आपल्या डोळ्यांना सकाळच्या कोवळ्या उन्हाची गरज असते.जर सकाळी हे घड्याळ सेट झालं तर रात्री शांत झोप लागते. पण हा प्रकाश खिडकीच्या काचेतून किंवा गॉगलमधून मिळालेला नसावा. सरळ सूर्यप्रकाश मिळण्यासाठी सकाळचा काही वेळ काढा किंवा ऑफिसला जाताना गाडीच्या काचाखाली करून सुर्याचे दर्शन घ्या आणि कवळ्या सूर्यप्रकाशाचा लाभ घ्या.

इमोशनल इंटेलिजन्स या पुस्तकातील वाक्य वाचून जरा थांबलोच.


असाच व्हॉट्सॲपचा स्टेटस बघत होतो.एका ठिकाणी डॉ.प्रभाकर शेळके यांचा ग्रामीण जीवनाचा ' सत्य ' सांगणारा कथासंग्रह या कथासंग्रहावर आमचे मित्र शरद ठाकर यांनी लिहिलेली वृत्तपत्रातील समीक्षा वाचली. त्यांनी आदरणीय डॉ.प्रभाकर शेळके यांचा भ्रमणध्वनी नंबर दिला.या समिक्षेवर व कथासंग्रहाबाबत लेखकांसोबत सर्वोच्च आत्मिय सुसंवाद झाला.बैल व बइल,देव व दैव या मानवी जीवनातील शब्दांमागची इमोशनल भावना,या संबधी अवर्णनीय अशी माहिती त्यांच्या ओजस्वी वाणीतून प्रकट झाली.साहेबांनी माझ्या सन्मित्र हाकेला पुस्तकरुपी ओ दिली,भेटस्वरुप म्हणून व्यवस्थेचा बइल हे पुस्तक मला मिळाले.प्रथमत:त्यांचे मनःपूर्वक आभार व धन्यवाद


१२ कथांचा हा संग्रह संपुर्ण ग्रामीण जीवनाचे जीवंत दर्शन घडवितो.यातील कथा,पात्र ही प्रत्येक माणसाची जिंदगी आहे.


मी माझाच उधळत गेलो.मस्तवाल बैलासारखा.मी या व्यवस्थेचा उधळलेला बैल हे 'प्रामाणिक मनोगत काळजाची ठाव घेते.डॉ.दादा गोरे यांची प्रस्तावना स्वतःला स्वतःसाठी स्वतःमध्ये कसं तटस्थपणे बघायचा 'आरसा' च आहे.या प्रस्तावनेमुळे हे पुस्तक समजण्यास सोपे जाते.


व्यवस्थेचा बइल,चांदणफुला,मुलडा,मिरग,जटायू,दंडुका,कंदुरी,

कुरण,खुरमुंढी,उमश्याचा बाप,भदपड्या,कुब्जा,संट्या अशा विचारांच्या या वेगवेगळ्या कथा,या कथा माणसात,मानसिकतेत झालेला बदल,गावांचं झालेलं शहरात रुपांतर,मुलभूत गरज व दिखाऊ गरज,

माणसाच्या माणुसकीचा होणारी घुसमट,प्रत्येक ठिकाणी स्वार्थीपणाने विविध पातळ्यांवर होणारी पिळवणूक,काय केलं व काय करायला हवं होतं याची भुमिका स्पष्ट करणारी सुक्ष्म रेषा म्हणजे हा कथासंग्रह


माय, तु मला जन्म दिला.तुझ्या पदराच्या सावलीत नाही विसावलो.तुझ्या दुधाचे उपकार कसे फेडू ? घरच्या दरिद्री परिस्थितीमध्ये बदल करुन सुखाचे चार घास खाण्यासाठी लवकरच मोठा झालेला लेक परिस्थितीतीचे चटके खातो.नोकरीसाठी गाव सोडावं लागतं.गावशिवारात राहिला नाही 'गोतावळा' उडाला 'पाचोळा' मनातली 'धग' घेवून शहरातल्या भोंगळ 'कोसल्या'मध्ये आणि म्हणून वाट्याला येतं आहे जगण्यातली 'काचवेल'.. नोकरीसाठी शिक्षण पदव्यांचा ढिग पण नोकरीच नाही.मी उध्वस्त आत्म्याचा कैदी ..शिंगे खिलार आहे,खांदा,रंग,शेपूट,दात सगळं चांगलं आहे.एकीकडे मनात सुगंधाशी लग्न करावं,एकीकडे बेकारीने तळपतो.ह्या व्यवस्थेत मी दीन झालेला नंदीबइल..विशाल मनाचं दर्शन होतं.


चांदणफुला जयर्‍याच्या प्रेमाचा झालेला चुराडा ही प्रेमकहाणी जीवनातील क्षणभंगुरता दाखविते.इकडे जयर्‍याचा वळू गावभर सैराट होऊन पळतो आहे.तिकडे संजीचा चांदणफुला आभाळ गोदतो आहे.


माणसं पैशासाठी काम करत्यात की,मरण पुढं लोटण्यासाठी कळतं नाही.हे कळण्यासाठी मुलडा प्रत्यक्ष वाचलाच पाहीजे.


शेतकर्‍यांचा उपाशी संघर्षमय जीवन प्रवास उपाशी पोटाने केली जाणारी बियाणांची खरेदी पाचशे एकावन्न रूपयाची खरेदी झाली.ते देण्यासाठी बगलखिशात हात घातला तर सगळं जगणंच थांबलेलं हे सर्व भयावह वास्तव आहे.मिरुग आहे.


तो,आयुष्याची काही लक्तरे बांधून जगतो आहे.गावशीव सोडून शहराच्या गुर्‍हाळात चिपाड होऊन.त्यानं घालवलेलं असतं आपलं मरणप्राय आयुष्य मी सुद्धा जटायू आहे याची जाणीव झाली.


नोकरीवरुन अचानक कारणाशिवाय काढून टाकल्यानंतर झालेली अनेक जीवांची घालमेल गावकरी,सरपंच यांनी न्यायासाठी दिलेला लढा प्रेरणादायी आहे.जगण्यासाठीचा दंडुका


कंदुरी माणसाच्या जगण्याचे वैविध्यपूर्ण स्वभाव मान,सन्मान,अपमान,प्रेम,जिव्हाळा,यांच आध्यात्मिक दर्शन देणारी कथा भावनेला हात घालते.


जग रडून ऐकतो हसून सांगतो हे जगण्याचं मर्म सांगणारं कुरणं सत्याच्या जवळ घेवून जाते.


खुरमुंढी व्यसनाधीनता व त्याचे परिणाम यावर भाष्य करणारी कथा बरंच काही सांगून जाते.


उमश्याचा बाप विचारांच्या पलिकडे विचार करायला लावतो.


भदपड्या,कुबदा,संट्या आवर्जून समजून,उमजून जीवन उलगडुन दाखविणार्‍या कथा अप्रतिम आहेत.


हा कथासंग्रह वाचत असताना त्याच्यासोबत मी दुसरं पुस्तक 'संन्यासारखा विचार करा'वाचत होतो.मी नेहमीच दोन पुस्तके वाचण्यास घेतो. या पुस्तकात एक प्रसंग आहे. लंडनमधील मंदिरात राधानाथ स्वामी व्याख्यान देत असताना त्यांच्याकडून सांगितलेली विचार पद्धत..! ज्यांनी मिठासारखं जगायला सांगितलं आणि आपल्या अन्नात खूपच मीठ असलं किंवा अगदीच कमी मीठ असलं तरच आपलं त्याच्याकडे लक्ष जातं याकडे आमचे लक्ष वेधलं,आत्तापर्यंत कोणीही कधीच असं म्हणत नाही की,'किती छान,या अन्नात अगदी योग्य प्रमाणात मीठ आहे.ज्या वेळी मिठाचा शक्य तितक्या उत्तम प्रकारे वापर केला जातो. त्या वेळी ते लक्षातही येत नाही.मिठ इतकं विनयशील असतं की, ज्यावेळी एखादा पदार्थ बिघडतो, त्यावेळी त्याचा दोषारोप ते स्वत:वर घेतं आणि ज्यावेळी काही सारं आलबेल असतं, त्यावेळी त्याचं श्रेय ते घेत नाही.


खरचं हा कथासंग्रह म्हणजे मानवी जीवनातील मिठच आहे.आदरणीय लेखक डॉ.प्रभाकर शेळके यांचे पुनश्च मनापासून आभार…!


● विजय कृष्णात गायकवाड




विजय कृष्णात गायकवाड

२९/११/२२

" करपलेली भाकरी मी व सौभाग्यवती..! "

माझी ही सकाळी सकाळी कामाला जायची लगबग चालली होती.( सौ. मेघा ) ही फारच गडबडीत होती.तव्यामध्ये भाकरी टाकली. व काही तरी कामासाठी ती बाहेर निघून गेली. मी सकाळी कामाला जाण्याअगोदरच जेवतो ..!


भाकरी तव्यामध्ये होती.मी सुक्ष्मपणे,चिंतनशीलपणे त्या भाकरीकडे पाहत होतो. हळूहळू भाकरी करपून धुर यायला सुरू झाला. काही वेळापूर्व संपूर्ण,सर्वश्रेष्ठ,

प्रकाशमय अशा भाकरीमध्ये अमूलाग्र बदल होत होता.भाकरी संपूर्ण काळी पडून करपरली यावेळेस 'तिचे' आगमन झाले...!


'तुम्हाला काय झालयं...? ही भाकरी दिसत नव्हती का..? मला हाक तरी मारायची ..? माझ्या वाटणीची भाकरी करपली ? तुम्ही हे मुद्दाम केलं आहे.दिसत असूनही तुम्ही गप्प बसलात,अवघड आहे या माणसाचं ..!


मी शांत निवांत करपलेल्या भाकरीचं तत्वज्ञान समजून घेतलं भाकरीला माणसाचा हात लागला नाही.तर अनपेक्षित असा तिच्यामध्ये आश्चर्यकारक बदल होतो.तिच्या अस्तित्वामध्ये असण्यामध्ये चिरंतन फरक पडतो.बदलनं,जागा सोडनं,उत्क्रांत होणं.जीवनातील हेच अटळ सत्य आहे." मग सूक्ष्मपणे विचार केला कि मी कधी बदलणार...!


"असाच काहीसा प्रसंग माझ्या नजरेसमोरून गेला.जो हेन्री डेव्हिड थोरो यांच्या सर्वोत्तम जीवनाशी निगडित आहे." ( जो हेन्री डेव्हिड थोरो यांचे चरित्र या पुस्तकातील आहे.)


" दोन दिवसांपूर्वी मला मारिया मावशीने डॉ.चॅमर्सचे चरित्र वाचण्यास सांगितले.मी अर्थातच तसे काही वचन तिला दिले नव्हते. 


कालच ती ओरडून शेजारच्या जेन मावशीला

( हिला कमी ऐकू येत असे ) सांगत होती,"काय माणूस आहे ! काल दिवसभर त्या बेडकांचे ओरडणे ऐकत उभा होता पण वाचायला सांगितली तर त्याच्याकडे चक्क दुर्लक्ष केलं त्याने...."


● विजय कृष्णात गायकवाड

२७/११/२२

" कोणीही तुमच्या मेंदूत सत्य ओतणार नाही.हे तुम्हाला स्वतःसाठी शोधायचे आहे." नोम चोम्स्की..

'तुम्हाला जर संधी मिळाली तर तुम्ही तुमची मुलं जाळून टाकाल,की तुमची पुस्तकं ?'असा विचित्र प्रश्न स्किनरनं त्याच्या पहिल्याच टेलिव्हिजनच्या कार्यक्रमात प्रेक्षकांना थेटपणे विचारला होता आणि इतकंच नाही,तर 'मी तर मुलांनाच जाळेन,कारण मानवी प्रगतीमध्ये माझ्या पुस्तकांमुळे माझ्या जीन्सपेक्षा जास्त योगदान मिळेल,'असंही त्या प्रश्नांचं स्वत:च सरळपणे उत्तरही दिलं होतं! अर्थातच त्याच्या या विधानावर प्रचंड गदारोळ झाला; बऱ्याच उलटसुलट चर्चाही झाल्या;

( जग बदलणारे ग्रंथ मधून सन्मापुर्वक )


… आदरणीय नमस्कार


जे तुम्ही शोधत असता ते देखील तुम्हाला शोधत असते.या प्रमाणेच आपला 'जग बदलणारे ग्रंथ' मला शोधत शोधत माझ्यापर्यंत आला.

अनुक्रमणिका वाचली आणि काहीतरी वेगळं सापडलेला भाव मला त्याच्या असण्याची जाणीव करून गेला.


सव्वीस पानांचे आदरणीय दीपा देशमुख यांचे असणारे मनोगत पुस्तकाचे महत्व,त्याच्याबद्दल अनेकांनी लिहिलेली कविता,घटना प्रसंग लेख मनाला जगण्याची उभारी देऊन गेले.


पुस्तकांचं/ग्रंथांचं महत्त्व प्राचीन काळात खूप जास्त होतं.याचं कारण आज कोणतंही पुस्तक स्वस्त आणि सहज उपलब्ध होतं.पूर्वी हस्तलिखितांच्या युगात ग्रंथ म्हणजे सोन्यापेक्षाही महाग असत.तीनशे-चारशे वर्षांपूर्वी संत एकनाथ महाराजांच्या काळात त्यांच्या 'भागवता'ची किंमत एक हजार रुपये (म्हणजे आजचे जवळजवळ अडीच ते तीन लाख रुपये) इतकी होती.एवढा पैसा खर्च करून लोक हस्तलिखित ग्रंथांचा संग्रह करीत असत.भागवत,रामायण,

महाभारत,या पोथ्या सावकारांकडे कर्जासाठी तारण म्हणून त्या काळी स्वीकारल्या जात होत्या. सोन्याचा वर्ख लावून त्या काळी ग्रंथातली अक्षरं लिहीत असत.


हे सर्व एकाच ठिकाणी व एकत्रितपणे वाचायला मिळाले व मनाला फार आनंद झाला.एकूण १८० ग्रंथांनी जग बदललं आहे. त्यातील ५० ग्रंथांची ही सांगड म्हणजे माणुसकी व मानवता यांचा शोध व सांगड घालणारी आहे. हा ग्रंथ म्हणजे समस्त मानव जातीला पडलेल्या प्रश्नाची उत्तरे आहेत.


वॉल्डन ही डेव्हिड थोरो यांची ही कादंबरी जयंत कुलकर्णी यांनी अनुवादित केलेली मी वाचलेली आहे. पण 'वॉल्डन टू' ही १९४८ मध्ये स्किनरनं प्रकाशित केलेली कादंबरी याची नोंद वाचून नवीन दृष्टिकोन तयार झाला.


एरिक फ्रामनं न्यूनगंड म्हणजे काय याविषयी अतिशय अप्रतिम असे विवेचन केलंय.

' न्यूनगंड म्हणजे मला असं वाटतंय की मला काही येत नाही असं नसून न्यूनगंड म्हणजे मला असं वाटतंय की इतरांना असं वाटतंय की मला काही येत नाही.' विचार करायला लावणारं हे विवेचन..


१८५९ मध्ये थोरोनं चार्ल्स डार्विनचं 'ओरिजिन ऑफ स्पिशिज' हे पुस्तक विकत घेऊन वाचलं.

( पुस्तक विकत घेऊन वाचणारी माणसं ही कोण असतात.ती गरीब नक्कीच नसतात ती तर श्रीमंत असतात.या तत्वाची आठवण झाली.)


या ग्रंथातील सत्याचे प्रयोग,द सेकंड सेक्स, ए ब्रिफ हिस्टरी ऑफ टाईम,इमोशनल इंटेलिजन्स, गन्स,जर्म अँण्ड स्टील,सेपियन्स:अ ब्रिफ हिस्टरी ऑफ ह्यूमन काइंड ही ग्रंथ मी वाचलेली आहेत.

हा ग्रंथ म्हणजे खरोखरच जग बदलणारा,माणूस बदलणारा ग्रंथ आहे.


आपले व मनोविकास प्रकाशनचे ( अरविंद पाटकर ) यांचे मनापासून मी आभार मानतो.सर्वोत्तम सर्वश्रेष्ठ असा हा जग बदलणारे ग्रंथ ( एकुण पृष्ठसंख्या - ४३२ ) माणसाला माणूस म्हणून विचार करायला भाग पाडतो सर्व शास्त्रज्ञांनी आपल्या आयुष्यामध्ये केलेली संशोधने,त्यासाठी त्यांना घ्यावा लागलेला त्रास त्यासाठी त्याला सोसाव्या लागलेला विरोध या सर्वांवरती विजय प्राप्त करून त्यांनी एक आदर्श समाज,आदर्श माणूस घडवण्यासाठी आपलं संपूर्ण आयुष्य खर्ची घातलं.अशा या सर्व ज्ञात अज्ञात लोकांचा जीवनपट आपण जिवंतपणे या ग्रंथाद्वारे समोर उभा केला आहे यामध्ये लेखक व प्रकाशक यशस्वी ठरलेले आहेत.

आपल्याकडून असेच सर्वोत्कृष्ट वैचारिक, बुद्धिजीवी ग्रंथांची व पुस्तकांची निर्मिती व्हावी हीच विनंती.


"कोणीही तुमच्या मेंदूत सत्य ओतणार नाही. हे तुम्हाला स्वतःसाठी शोधायचे आहे." 

नोम चोम्स्की यांच्या विचारांचा आठवण करून देणारा हा ग्रंथ आहे.आपले पुनश्च एकदा आभार धन्यवाद.

२५/११/२२

जाणून घेवू प्राण्यांबद्दल वेगळ असं काहीतरी..

माकड,शेळी,बकरी,कुत्री हे आपल्या पिलांचा आवाज चार वर्षानंतरही ओळखतात व त्याला बिलगतात.


आता जाणून घेऊया कॉफीच्या व मोहाच्या शोधाबाबत..


कॉपी व मोहाचा शोध शेळ्या व मेंढ्यामुळे लागला आहे.मध्यएशियातील ही कहाणी आहे काही शतकांपूर्वीची एकदा एक मेंढपाळ आपल्या शेळ्या बकऱ्या घेऊन चरण्यासाठी घेऊन गेला होता.त्याचं चरणं चालू असताना त्याच्या शेळ्या मेंढ्यांनी एक फळ खाल्लं आणि त्या उड्या मारायला लागल्या त्यांच्यामधील असणारी एनर्जी,त्यांच्यामधील असणारा उत्साह अचानक वाढू लागला.आणि त्या सैरावैरा इकडे तिकडे धावत जावू लागल्या,आणि उड्या मारू लागल्या त्या मेंढपाळाला काय समजेना कोणता तरी विषारी पदार्थ खाल्ल्यामुळे काय तरी होते आहे का?असा त्याला प्रश्न पडला.पण याचे उत्तर थोडावेळ थांबल्या नंतर त्याला मिळाले.

असाच थोडा वेळ गेला.आणि नंतर त्यांचा तो उत्साह त्यांचे उड्या घेणे,थांबले,आणि त्या नेहमीप्रमाणे चरायला लागल्या.अशाप्रकारे दररोज ते फळ खाल्ल्यानंतर त्यांना असंच व्हायचं उड्या मारणं सैरावैरा पळण्याचा प्रकार वारंवार बघितला आणि शेवटी त्याने निरीक्षण केलं आणि ते फळ खाऊन त्याने स्वतः खावून बघितलं,त्यानंतर त्यालासुद्धा ते फळ खाल्ल्यानंतर एक विशिष्ट प्रकारची ऊर्जा निर्माण झाल्यासारखी वाटली.आणि इथे कॉफीचा शोध लागला.


अशाच एका दिवशी हरणाने सहज मोहाची फुले खाल्ली आणि ती झिंगायाला लागली.असं दोन-तीन वेळा झाल्यानंतर माणसांनी त्याचं निरीक्षण केलं.आणि ती फुल स्वतः खाऊन बघितली आणि त्यांनाही तसेच वाटलं आणि या फुलापासून उत्तेजना निर्माण होते,झिंगायला होतं याचा त्यांना शोध लागला.तर अशाच शोधांमध्ये प्राण्याचीही भूमिका महत्त्वाचे असते.


या प्राणी जीवांच्या संवेदना,भावना, बुद्धिमत्ता,प्रेम ह्या काही वेळा स्वतः ला बुद्धिमान समजणारा 'माणूस' ही समजू शकत नाही.


एका ठिकाणी पोल्ट्री फार्म होता.ही घटना साधारणतःत्यावेळची आहे ज्यावेळी कॅमेरे नव्हते.या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अंडी निर्मितीची प्रक्रिया चालायची.व ती अंडी योग्य ठिकाणी पोहोचवली जायची.यासाठी कर्मचारी वर्ग ही मोठा होता.बरेच दिवस सर्व काही सुरळीत चाललं होतं.आणि एक दिवस नोंद घेण्यासारखी घटना घडली.त्याचं झालं काय दिवसभरामध्ये जमलेली सर्व अंडी मोजून एकत्रितपणे क्रेटमध्ये व्यवस्थित लावली जायचीत.यासाठी विशिष्ट जबाबदार व्यक्ती होती.ती या सर्व गोष्टींची नोंद घेत असे.आदल्या दिवशी सायंकाळी मोजणी झाली.त्याची नोंदणी केली.दुसऱ्या दिवशी ती अंडी ठराविक ठिकाणी पोहोचवण्यापूर्वी आणखी एकदा खात्री करण्यात आली.तर त्यावेळी २०० अंडी कमी लागली.एक दोन अंड्यांचा फरक नव्हता.तर तो फरक होता तब्बल १०० ते २०० अंड्यांचा परत दुसऱ्या दिवशी नियमाप्रमाणे काम सुरू झाले. ते सायंकाळी बंद झाले.अंड्यांची मोजणी व नोंदणी झाली.दुसऱ्या दिवशी सकाळी परत मोजली असता २०० अंडी कमी पडलीत.या प्रसंगाने संबंधित व्यक्तीला घाम फुटला.त्याला काहीच कळेना.त्यांने ही गंभीर घटना वरिष्ठांना सांगितली.त्यांनाही आश्चर्य वाटले.संशयाने सर्व लोकांची कसून तपासणी करण्यात आली. या सर्व नियमाची शिस्तबद्ध पद्धतीने अंमलबजावणी होत होती. पण तिकडेही दररोज २०० अंडी गायब होत होती. संपूर्ण रात्र पहारे ठेवण्यात आले.स्टोअरवरही 'निगराणी' ठेवण्यात आली.


इतके सगळे करूनही ठोस असे कोणतेच कारण सापडेना.सगळ्यांनी विचार केला पण काही सूचेना,ज्यावेळी आपण सर्व विचार करतो. आणि आपल्याला काही सुचत नाही.त्यावेळी आपण म्हणतो, 'की ही काहीतरी भुताटकीची भानगड आहे.भुताटकी आली कि पोटात भीतीचा गोळा आलाच.


मग एकदा रात्री एक धाडस करायचं ठरवलं स्टोअरची रात्री तपासणी करून निरीक्षण करायचे ठरले.मग रात्री उशिरा स्टोअरमध्ये जावून लाईट लावून पाहीले.सर्वकाही व्यवस्थित होते.


मग त्यांनी एक 'वेगळा' विचार केला.दुसर्‍या रात्री अंधारात या कारणाचा शोध घेण्याचे ठरले. त्याप्रमाणे त्यांनी शोध घेतला. त्यावेळी अंधारात त्यांनी जे पाहिलं. ते पाहून त्यांना आश्चर्याचा धक्का बसला.


त्यांनी अंधारात पाहीलं होत.दोन उंदीर हळूच बिळातून बाहेर यायचे.ज्या ठिकाणी अंड्याचा क्रेठ ठेवला होता.तिथेपर्यंत दोन उंदीर जायचे दोन पायांनी अंडी उचलून तिथेच जवळ असणाऱ्या टेबलावर ठेवून पायाने अंडी खाली सोडून द्यायचेत.अंडे खाली पडल्यानंतर फुटू नयेत. म्हणून विशिष्ट प्रकारचे मॅट खाली अंथरलेले असल्याकारणाने ती अंडी फुटत नव्हती.खाली पडलेली अंडी दुसरे दोन उंदीर ढकलत पुढे घेवून जात.तिथून पुढे दुसरे उंदीर अशी एक संपूर्ण टीम ((टीमवर्क म्हणजे काय अंडी फुटू नये म्हणून केले जाणारे काम याचे निरीक्षण उंदरानी केलेले होते.)त्यामुळेच हे काम हुशारीने नियोजन पध्दतीने ती करत होती.


ही काम करण्याची पद्धत ज्याला आपण टीमवर्क म्हणतो.त्या टिमवर्कचे काम हे उंदीर दिवसभर बघत असायचेत. त्याच पद्धतीने त्यानी हे काम केले होते. ही त्यांची ही काम करण्याची पद्धत (टिमवर्क) बघून त्यांची बुद्धिमत्ता पाहून सर्व लोकांना हसू आवरता आले नाही.


मग सावकाशपणे त्यांच्या बिळांचा शोध घेतला. आणि त्या ठिकाणी उकरले असता त्यांच्या बिळामध्ये शेकडो अंडी होती. काही फुटलेली, काही खाल्लेली तर काही तशीच पडलेली. त्यांची ती बिळे त्यांनी मुजवून टाकलीत. व या प्रकरणावर पडदा पडला. ही होती उंदरांच्या बुद्धिमत्तेची गोष्ट..!


दुसरी सत्य घटना आहे कोथरूडमध्ये घडलेली. असंच एक कुटुंब ज्या कुटुंबातील सर्व लोकं नोकरीनिमित्त घराबाहेर जायचे.प्रत्येक घरात फ्रिज हा असतोच तसा यांच्याही घरी फ्रीज होता.आणि त्यांनी फ्रिजमध्ये वरच्या बाजूला अंड्याच्या ट्रेमध्ये अंडी ठेवलेली असायची आणि एक दिवस अशी एक घटना घडली की ज्यामुळे त्यांना विचार करायला भाग पडलं पाच सहा अंडी होती त्यातील एक दोन अंडी ही मोकळीच होती.( त्यातील पिवला बलक गायब होता.) त्यांना आश्चर्य वाटलं अंड्याला कुठेही तडा गेलेला नाही,अंड कुठेही फुटलेले नाही वरचं कवच तळ व्यवस्थित आहे,मग आतला बलक कुठे आहे?असे प्रकार वारंवार घडायला लागले. त्यांनी याचा शास्त्रीय शोध घेण्यासाठी प्रयत्न केला पण उत्तर काय सापडेना ती नवीन अंडी आणून ठेवायचीत आणि दुसऱ्या दिवशी ती अंडी मोकळी असायचीत.आता गमंतीचा भाग सुरू होतो.एक दिवशी सुट्टी असल्यामुळे सर्वजण घरात होते. (मांजरीच्या हे लक्षात आले नाही.) आणि एक मांजर नेहमीप्रमाणेच तिथे आली तिने हळूच फ्रीजचा दरवाजा थोडाच उघडला आणि एका पायाने तो दरवाजा धरला आणि दुसऱ्या पायाच्या नखाने त्या अंड्यावर टक्क करुन एक लहान छिद्र पाडले आणि त्यातून बलग तिने ओढून घेतला.त्या मांजराने अभ्यासपूर्ण निरीक्षण केले होते,त्या घरातील लोकांची कामावर जाण्याची वेळ,फ्रीज कसा उघडतात तो कसा झाकतात कोणत्या ठिकाणी अंडे आहेत यातून तिने 'शिक्षण' घेतले होते.त्याचा न चुकता वापर करत होते.या प्रत्यक्ष बघितलेल्या घटनेमुळे त्यांना हायसे वाटले,या प्रश्नाचे अचूक उत्तरही सापडले आणि मांजरीच्या बुद्धिमत्तेचे कौतुकही त्यांना वाटले.


'निसर्गाची नवलाई' सतीश खाडे यांच्या पॉडकास्ट वरून…


★ विजय कृष्णात गायकवाड.


२३/११/२२

■ मानवतेची आठवण करून देणारी माऊली..

आज दुपारी गरगरीत बासुंदी पुरीचं जेवण मनसोक्त तुडुंब करुन,दही बुत्ती खाऊन,मस्तपैकी लावून आणलेले पान तोंडामधे धरुन,हातामधे पुढारी घेऊन,बाहेरच्या खोलीत तक्क्याला टेकून निवांत बसलो होतो.


अंगणामधे बऱ्यापैकी ऊन पसरलेलं होतं... समोरच्या रस्त्यावर दुपारची शांतता पसरलेली... एखाद दुसरी गाडी किंवा रिक्षा ये जा करत होती..


समोरच्या घराच्या नारळाच्या झाडाच्या सावलीत एक भंगारवाला आपली हातगाडी लावून तिथेच हातगाडीवर फडक्याची पुरचुंडी सोडून भाकरी आणि कसली तरी भाजी खात होता... हातगाडीवर तेल,डालडा,पावडरीचे रिकामे डबे, बियरच्या रिकाम्या बाटल्या त्याने गोळा केलेल्या वेड्यावाकड्या पडल्या होत्या...


आणखी एका घरासमोर एक बोहारीण बसलेली... समोर ती डबे-भांड्यांची टोपली ठेवलेली आणि शेजारी जुन्या कपड्यांचे गाठोडे ठेवलेले... डोक्यावरची चुंबळ तशीच डोक्यावर होती... थकली भागली जर्मनच्या तपेलीतले पाणी गळ्यातली गोटी खालीवर करत घटघट पीत होती... पदराने चेहेरा पुसत होती...


दुपारची गरम शांतता होती ती !


तेवढ्यात कानांवर आवाज आला... "जांभळं घ्या... जांभळं ! काळीभोर टप्पोरी... खास रानातला मेवा फक्त तुमच्यासाठी... "


जांभळं म्हटल्यावर ताड्कन् कॉटवरुन उठलो आणि अंगणात आलो... त्या मावशीला हांक मारली... आत बोलावले... अंगणात आली... ती दोघं होती... ती आणि तिचा नवरा ! त्याने डोक्यावरची जांभळाची पाटी जमिनीवर उतरवली आणि पाटीला बांधलेले कापड सोडले... आईशप्पथ... पाटीभर काळीभोर, टप्पोरी जांभळं ! प्युअर डायरेक्ट रानातून आलेली... दर विचारला...


मावशी म्हणाली ," १०० रु. किलो..."


आई आतून आली, "७५ ला किलो दे... तेवढ्यात मिळतायत... "


मावशी..."न्हाय ओ आज्जी... ७५ ला न्हाय मिळत आता आसली जांभळं... १०० चा दर हाय बघा... "


मी तिथेच बाजूला अंगणात सावलीत मांडी घालून बसलो होतो.हे संभाषण ऐकून मी मधे पडलो, "द्या मावशी एक किलो...  आणि दोन चार जांभळं उचलून खायला सुरुवात केली... तोवर आई घरामधे पातेलं आणायला गेली, आणि तेवढाच चान्स घेऊन मी मावशीच्या हातात १२५ रु. टेकवले आणि पट्कन तिला खुणावून लपवायला सांगितले.., तिने पण ते पट्कन लुगड्याच्या केळ्यात लपवले...


आई पातेलं घेऊन आली... ते तराजू मी हातात घेतला आणि अर्धा अर्धा किलोचे दोन वेळा वजन करुन एक किलो जांभळं वजन करुन पातेल्यात ओतली... मी अजून सहा सात जांभळं हातामधे घेतली आणि मस्तपैकी अंगणातच मांडी घालून खात बसलो.


आई पातेलं आत ठेवायला गेली तेवढ्यात मावशी म्हणाली, "दादा, वाईच दोन घास खाऊन घेतो इथं बाजूला सावलीत बसून !"


"बसा ओ मावशी... घ्या जेवण करुन निवांत !"


सैय्याला सांगून त्यांना छोट्या कळशीतून पाणी दिले... आईने दोन वाट्या बासुंदी आणि चार पाच पुऱ्या आणून दिल्या.


मावशीने तिची ती फडक्यात बांधलेले दुपारचे जेवण सोडले... मस्तपैकी तीन चार दशम्या दिसल्या मला... त्यात छानपैकी तेलात भिजवलेली लसणाची चटणी... तो तेलसर लाल रंग भाकरीच्या तलम पापुद्र्यावर पसरलेला... दुसऱ्या एका छोट्या डब्यातून तिने वांग्याची रस भाजी काढली... दोघांच्या मधे तिने ते कापड पसरले दोन भाकऱ्या नवऱ्याला आणि एक स्वतःसाठी घेतली... दोघांनीही काही सेकंद डोळे मिटून नमस्कार केला आणि शांतपणे जेवायला सुरुवात केली... जेवण झालं... मावशींनी सगळं आवरलं... जिथे ते दोघे जेवले तिथल्या फरशीवर पाणी शिंपडून जागा स्वच्छ केली... पाण्याची कळशी विसळून दरवाज्यात ठेवली... बासुंदी पुरी दिलेला वाट्या आणि ताटली स्वच्छ करुन कळशीला टेकवून ठेवली आणी घटकाभर अंगणातल्या आंब्याच्या झाडाखाली तसेच बसून राहिले...


तिच्या नवऱ्याने चंची उघडली... अडकित्त्याने सुपारी कातरुन मला दिली आणि स्वतःही तोंडात टाकली... पाच सहा नागवेलीची पाने हातामधे घेऊन तळव्यावर पसरुन ठेवली... अंगठ्याची नखुली पानांच्या शिरांवर हळूवार फिरवत त्याने शिरा मऊ केल्या... केशरी चुना अंगठ्यावर घेऊन छानपैकी पानांवर लावला आणि पानाची घडी माझ्याकडे सरकवली... आपणही खाल्ली... वर काथाचे तुकडे दिले आणि नंतर छानपैकी काळी तंबाखू लयदार मळून चिमूटभर मला देऊन आपणही तोंडात डावीकडे बारीक गोळी ठेवली. मस्त समाधान उतरलं !


पाचदहा मिनीटानंतर ती दोघेही निघायला उठली... तिने आईला हांक दिली, "आज्जी... आमी जातोय हं !"


आईने आतून,"थांब गं जरा दोन मिंटं !" सांगून थांबायला सांगितले.


आई बाहेर आली. आईच्या हातामधे हळदकुंकवाचा करंडा आणि छोटा स्टीलचा डबा होता. आईने तिला हळद-कुंकू लावले,तिनेही आईला लावले आणि आईने हातातला स्टीलचा डबा तिला देत सांगितले, "यात बासुंदी आहे वाडीची ! संध्याकाळी घरी गेल्यावर तुझ्या मुलांना दे खायला  !"


ती नको नको म्हणत असताना आईने तो डबा तिच्या पाटीमधे ठेवला.


ती दोघेही पुढे आली आणि वाकून आईला नमस्कार केला... "माऊली... माऊली..." असं काहीसं पुटपुटले !


आई आतमधे गेली... ती दोघे माझ्याकडे आली, "दादांओ...!" म्हणत खाली वाकली माझ्या पायाला स्पर्श केला !


मी थोडा दचकलो... पट्कन् मी ही वाकून त्यांच्या पावलांना स्पर्श करत असताना नकळत पणे माझ्या तोंडातून बाहेर आले, "माऊली... माऊली !"


त्याने खिशात हात घालून छोटी कागदाची पुडी काढली, उघडली ! आत मधे बुक्का होता... चिमटीत बुक्का घेत त्याने माझ्या कपाळावर टेकवला आणि म्हणाला, "दादा, लै शिरीमंत हायसा बगा तुमी ! आवो,माऊली नांदतीया तुमच्या घरात... !" नंतर त्याने दरवाजाच्या उंबऱ्यावर डोकं टेकवले आणि मागे वळून पाटी उचलून मावशीच्या डोक्यावर ठेवली,पिशवी हातामधे घेतली... आणि गेट उघडून दोघेही मला पाठमोरे होऊन लांब लांब जायला लागले... वाऱ्यावर विरत जाणारा मावशींचा आवाज येत होता कानांवर...


"जांभळं घ्या... जांभळं ! काळीभोर टप्पोरी... खास रानातला मेवा फक्त तुमच्यासाठी..


लेखक - अनामिक


कोल्हापूरचे आमचे मित्र विनायक पाटील यांनी ही कथा मला पाठवून जतन करायला सांगितली.

२१/११/२२

निकोलस कोपर्निकस Nicholas Copernicus (१९ फेब्रु. १४७३ १५४३)

२४ मे पोलंड मधील टोरून येथे जन्मलेल्या या प्रतिभावंताने लॅटीन आणि ग्रीक भाषेत आपले शिक्षण पूर्ण केले. इटलीतील बोलोन्या विद्यापीठात त्यांनी गणित,पदार्थविज्ञान आणि खगोलशास्त्राचा अभ्यास केला.कोपर्निकसचे इटलीतील प्रमुख विद्यापीठांशी,चर्च तसेच चर्चचे प्रमुख पोप यांच्याशी सौहार्दाचे संबंध होते. या संबंधाचा त्याला जसा फायदा झाला तसाच तोटाही सहन करावा लागला. 'सर्व विश्वाचा मध्यबिंदू पृथ्वी की सूर्य ?' हा एक वादाचा मुद्दा कोपर्निकसने चर्चेत आणला होता. सॅमोस येथील अरिस्टार्कस याने मांडलेला 'सूर्यकेंद्रित' म्हणजे सूर्याभोवती पृथ्वी फिरते हा सिद्धांत मागे पडलेला होता.सन १५०० सालापर्यंत 'पृथ्वीकेंद्रित' टॉलेमी-ॲरिस्टॉटलचा सिद्धांत धर्माच्या छायेखाली टिकून होता.


टॉलेमीपासून चालत आलेली पृथ्वीकेंद्रित सिद्धांताची कल्पना कोपर्निकसला अपुरी वाटत होती. त्याच्या विचारांची दिशा प्रथमपासूनच प्रचलित

मतांविरुद्ध,पृथ्वीकेंद्रित सिद्धांताविरुद्ध होती.अनेक वर्षे त्याने आपल्या मतप्रणालीवर निरीक्षणपूर्वक चिंतन केले. सूर्य स्थिर असून पृथ्वीसह इतर सर्व ग्रह त्याभोवती फिरतात हे त्याने १५१० साली एका लेखाद्वारे मांडले. सदर लेख 'कॉमेंटरी ऑलस' या लहान टीकात्मक पुस्तकातून पुढे आला. हे पुस्तक १५१४ च्या आसपास प्रसिद्ध झाले. सदर पुस्तक पोप क्लीमेंटच्या निदर्शनास आल्यावर हा संपूर्ण सिद्धांत प्रसिद्ध करावा म्हणून त्याने सूचना केली. त्याचप्रमाणे प्रोटेस्टंट पंथातल्या फॉन लॉखन अर्थात ऱ्हेटिकस यानेही कोपर्निकसला संपूर्ण पुस्तक लिहिण्यास गळ घातली. पण आपले मत ग्रंथरूपाने प्रसिद्ध करण्यासंदर्भात कोपर्निकसला उत्साह वाटत नव्हता. राजसत्ता, धर्मसत्ता आणि पोप यांची भीती त्याला सतावत होती.


कोपर्निकस हा धर्मनिष्ठ होता. प्रस्थापित मतांना एकदम धक्का द्यावा असे त्याला वाटत नव्हते. पण सत्य लपवून ठेवावे हेही त्याच्या मनात येईना. शेवटी हेटिकसने पुस्तकाच्या प्रकाशनाचे काम हौसेने अंगावर घेऊन छपाईचे कामही चालू केले. दरम्यान जुलै १५४० मध्ये ॲड्रियस ओसियांडर या आपल्या मित्राला पत्र लिहून कोपर्निकसने पुस्तक प्रसिद्ध करण्यासंदर्भात सल्ला विचारला. सिद्धांत सत्य असल्याचा दावा न करता गृहितक मानले तर टीकेला तोंड देता येईल असे ओसियांडरचे मत होते. पण कोपर्निकसला आपला सिद्धांत सत्य असल्याची खात्री असल्यामुळे अशा तऱ्हेची तडजोड त्याला मान्य होण्यासारखी नव्हती. पुस्तकाची छपाई सुरु असताना कोपर्निकस मात्र अंथरूणावर खिळून होता.


इ. स. १५४३ मध्ये 'ऑन द रिव्होल्यूशन्स ऑफ द सेलेस्टीअल ऑब्जेक्टस' (On the Revolutions of the Celestial Objects) ही स्वतःच्या पुस्तकाची प्रत हातात आली तेव्हा कोपर्निकसला धक्काच बसला. असे म्हणतात की, आपल्या सिद्धांताला विरोधी प्रस्तावना पाहून १५४३ मध्ये काही तासातच कोपर्निकसचा मृत्यू झाला. हे खळबळजनक पुस्तक पोपला समर्पित केलेले होते.कोपर्निकसच्या मृत्यूनंतर या पुस्तकाची प्रस्तावना एक चर्चेचा विषय ठरली. कारण प्रस्तावनेत सूर्यकेंद्रित सिद्धांत ठामपणे मांडलेला नव्हता तर एक गृहितक म्हणून वापरावा,ज्यायोगे गणितातील निष्कर्ष काढणे सोपे होईल एवढेच त्यात म्हटलेले होते.


गेल्या शतकाच्या शेवटी प्रागमध्ये कोपर्निकसचे स्वतःचे हस्तलिखित सापडले. त्याला शीर्षक नाही, प्रस्तावना नाही. किंबहुना हस्तलिखित आणि प्रकाशित आवृत्तीमध्ये अनेक बदल झालेले होते. हे बदल करण्यामध्ये हेटिकस अथवा ओसियांडरचा हात होता हे निश्चितच. प्रस्तावना बदलली म्हणून एखाद्याचे विचार मात्र कोणीही बदलू शकत नाही. कोपर्निकसच्या या क्रांतिकारी सिद्धांताने त्याच्या मृत्यूनंतर सोळाव्या आणि सतराव्या शतकात धर्मामध्ये खळबळ उडवून दिली. त्याच्या सिद्धांताला धर्ममार्तंडांनी विरोध तर केलाच पण काही खगोल वैज्ञानिकांनीही विरोध केला.अर्थात दोहोंच्या विरोधामध्ये गुणात्मक फरक होता. खगोलवैज्ञानिकांचा विरोध हा निरीक्षण आणि पुराव्याशी निगडीत होता.


सफर विश्वाची - डॉ.नितीन शिंदे

नागनालंदा प्रकाशन इस्लामपूर


१९/११/२२

बर्म्युडा ट्रेंगल - गूढ रहस्य की निसर्गाची कमाल?

अँटलांटिक महासागरात फ्लोरिडा,बर्म्युडा आणि प्यूर्टोरिको या तीन ठिकाणांना जोडणारा एक भाग या समुद्रात आहे.त्रिकोणाकृती असलेल्या या भागाला 'बर्म्युडा ट्रॅगल' म्हटलं जातं.हाच भाग डेव्हिल्स ट्रेंगल या नावानंसुद्धा कुप्रसिद्ध आहे. त्याला कारणही तसंच आहे.या भागात अनेक विमानं तसंच मोठमोठी जहाज गायब झाली आहेत.त्यांचा तसंच त्यावरचे कर्मचारी तसंच प्रवासी यांचा नंतर काहीही ठावठिकाणा लागला नाही.कित्येक वर्षं हे सगळं गूढ बनून राहिलं होतं.त्याविषयी विविध तर्कवितर्क केले अनेक अफवा उठल्या.समुद्री चाच्यापासून अगदी परग्रहावरच्या जिवांपर्यंत (एलियन्स) असे सर्व अंदाज लोकांनी बांधले.असं काय रहस्य होतं त्या भागात ?


'बर्म्युडा ट्रॅगल'ची ओळख तशी जुन्या काळापासून होती.अनेक दर्यावर्दींना या भागात काहीतरी रहस्यमयी आहे हे लक्षात आलं होतं. ५०० वर्षांपूर्वी ख्रिस्तोफर कोलंबस जेव्हा पहिल्यांदा जगप्रवासाला निघाला तेव्हा त्यानं प्रथम याचा उल्लेख केला होता.१४९२ साली या भागातून जात असताना त्यान अद्भुत आणि भयावह असं काही तरी बघितलं.एका रात्री त्यानं या भागात आगीचा एक प्रचंड असा आगडोंब बघितला.त्याच्याकडचं होकायंत्र विचित्र प्रकारे दिशा दाखवत होते.वादळ नसतानाही प्रचंड मोठ्या लाटा तिथं उसळत होत्या.


१९१८ मध्ये 'यू.एस.एस.सायक्लोप्स' (USS cyclops) हे जहाज बार्बाडोसमधून 'मँगनीज' हे खनिज घेऊन निघालं.३०९ कर्मचाऱ्यांना घेऊन निघालेलं हे जहाज रहस्यमयरीत्या अदृश्य झालं. नंतर त्या जहाजाचा आणि त्यावरच्या कर्मचाऱ्यांचा शोध लागला नाही. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात प्रोटिअस आणि नेरिअस ही दोन जहाजं तेच मँगनीज खनिज वाहून नेताना याच भागात बेपत्ता झाली आणि त्यांचाही पुढे शोध लागला नाही.५ डिसेंबर १९४५ रोजी या भागात घडलेल्या अजून एका गूढ घटनेनं साऱ्या जगाचं लक्ष वेधून घेतलं! अमेरिकन नौदलाची 'फ्लाईट १९' ही पाच 'टीबीएम अँव्हेजर (TBM Avenger) या बॉम्बर्स विमानांची तुकडी प्रशिक्षणासाठी या भागावरून जात होती.ही संपूर्ण तुकडी तिथं गायब झाली.त्या घटनेनंतर लगेचच या विमानांची शोधाशोध सुरू झाली.अनेक विमानं त्यासाठी रवाना झाली.त्यापैकी एक असलेलं 'पीबीएम मरीनर' (PBM Mariner) हे विमान त्यातल्या १३ कर्मचाऱ्यांसह याच ठिकाणी बेपत्ता झालं.यापैकी कोणत्याच विमानाचा शोध लागला नाही.


फ्लोरिडाच्या किनाऱ्यावरच्या एका जहाजावरच्या कर्मचाऱ्यांनी त्या वेळी आकाशात मोठे स्फोट झाल्याचं सांगितलं होतं.त्यानंतर तिथं मोठं वादळही आलं होतं.शेवटी वाट चुकल्यानं आणि वादळात सापडल्यानं ही विमानं अपघातग्रस्त झाली असावीत,असा निष्कर्ष अमेरिकन नौदलाकडून काढण्यात आला. बर्म्युडा ट्रँगलमध्ये गायब झालेल्या अथवा दुर्घटनाग्रस्त झालेल्या जहाजं विमानांची यादी फार मोठी आहे. ७५ च्या आसपास विमानं तर १०० हून अधिक जहाजं इथं गायब झाल्याचं सांगितलं जातं.या भागातून जाणारी जहाजं किंवा विमानं अत्यंत रहस्यमयरीत्या बेपत्ता होतात आणि त्यांचा कुठंच शोध लागत नाही हे प्रत्येक घटनेनंतर सिद्ध होत गेलं.


अनेक वैज्ञानिक यामागचं नेमकं कारण शोधण्याचा प्रयत्न करत होते.शतकानुशतकं हे प्रयत्न चालू होते.पण त्यांना यश न मिळाल्यानं यामागचं गूढ वलय आणखीनच दाट होत गेलं. भुताखेतांचा वावर,समुद्री चाच्यांची लूटमार, परग्रहावरचे जीव अर्थात एलियन्स,चक्रीवादळ, मानवी चुका,होकायंत्रात होणारे बदल तसंच या क्षेत्रात असलेलं मिथेन हायड्रेट्सचं जास्त प्रमाण अशा एक ना अनेक शक्यता वर्तवल्या गेल्या. तरी खात्रीशीर असं कुठलंही कारण सापडत नव्हतं.अलीकडच्या काळात शास्त्रज्ञांच्या एका संशोधनादरम्यान मात्र हे रहस्य उलगडलं आहे. निदान तसा दावा तरी आहे.या दाव्याप्रमाणे त्या भागात षटकोनी ढगांची निर्मिती होते आणि हे ढग एखाद्या 'एअरबॉम्ब'सारखं काम करतात.या ढगांमध्ये मेकॅरोबर्स्ट तयार होऊन ते वेगानं समुद्रावर आदळतात.त्यामुळे तिथं २५० किमी प्रतितास यापेक्षाही अधिक वेगानं वारे वाहतात आणि प्रचंड मोठ्या लाटा निर्माण होतात. त्यामुळे विमानं आणि जहाजं तिथून पुढे जाऊ शकत नाही आणि तिथंच गायब होतात असं या नव्या संशोधनात सांगितलं गेलं आहे.


'प्रवास' या पुस्तकातून अच्युत गोडबोले व आसावरी निफाडकर,मधुश्री पब्लिकेशन





१७/११/२२

.. सत्यकथा थक्क करुन सोडणारी

हावरटपणा,सर्व काही मलाच मिळाले पाहिजे.हा स्वार्थी विचार,व स्वार्थी वागणं पक्षी,प्राण्यांकडून कधीच होत नाही.ही सर्वजण निसर्ग नियमातून जीवन जगणारी असतात.


मेनन पिस्टन रिंग्ज (टोप,संभापूर) या ठिकाणी मी जनरल कास्टींगमध्ये ( फौन्ड्री ) काम करतो.या ठिकाणी प्रिसिजन मशिन् ड कास्टींग उत्पादनाची निर्मिती होते.शारीरिक श्रमाची कामे असतात.ज्यामुळे जीवनातील 'प्रतिष्ठा' वाढीला लागते.कंपनी म्हणजे जिव्हाळ्याचं,प्रेमाचं ठिकाणं आमचे 'वरिष्ठ साहेब' हे फारच मनस्वी स्वभावाचे आहेत.राकेश सावंत,सचिन पाटील,ही माणुसकी जतन करत असताना.कामामध्ये न कळत चुक झाल्यास 'शिक्षा न देता शिक्षण देतात' त्याचबरोबर सर्वोत्तम असा (HRD) विभाग,(मानव संसाधन विभाग कंपनीच्या जो मानवी संसाधनांचे व्यवस्थापन करतो.) याठिकाणी सुसंवाद साधून 'चांगुलपणा' आपल्या वागण्यातून शिकवणारे काळे साहेब कंपनीमध्ये वीजेचा अनावश्यक वापर बंद करुन वीज वाचवणे काळाची गरज आहे.वीज जीवनातील महत्वाचा भाग आहे.म्हणून ते प्रत्यक्ष येवून दिवस सुरु होताच लाईट बंद करतात.(थॉमस अल्व्हा एडिसन यांना आनंद नक्कीच झाला असेल.) त्यांना या संदर्भात बोललो असता ते सहजच म्हणालेत,आपण चांगलं करत रहायचे म्हणजे चांगुलपणा आपली पाठराखण सदैव करतो.


या ठिकाणी असाच एक प्रसंग संवेदनशील मनाला भावनिक भुरळ घालून गेला.या ठिकाणी पपईचे एक झाड आहे.(आमच्या कंपनीमध्ये निसर्गाचे जतन केले जाते.) या झाडावरती पपई लागलेल्या आहेत. एक वानर या झाडावरती चढले या झाडावर लागलेल्या सर्व पपई त्याने हाताने दाबून पिकलेल्या आहेत का? याची खात्री केली एकही पपई खाण्यासाठी पिकलेली नव्हती.ज्या सन्मानाने ते वानर त्या झाडावर चढले होते.त्याच सन्मानाने ते खाली उतरले.कोणत्याही प्रकारचा राग नाही. कोणत्याही प्रकारचा त्याचा इगो दुखावला नाही. 'जे जसं आहे,ते तसं त्यानं स्विकारलं' हा माणसाला बरंच काही शिकवणारा प्रसंग मी प्रत्यक्ष पाहिला नाही.पण फेटलिंग या विभागात काम करणारे 'माणुस' असणारे आमचे सहकारी मित्र 'सोहेल' यांनी हा ह्रदयस्पर्शी प्रसंग याची देही याची डोळा पाहिला.व पळत येवून मला सांगितला. हा धडा मला बरचं काही सागून गेला.हा प्रसंग ऐकल्यानंतर माझ्यामध्ये असणारा प्राचीन व सनातन DNA मात्र सुखावला..!


'पाखरमाया' हे मारुती चितमपल्ली यांनी लिहिलेल्या पुस्तकाचे वाचन सुरू होते.यावेळी या पुस्तकातील एक मुलाखत बरचं काही ज्ञान देऊन जाते.

एस. एच. स्केफ या कीटकशास्त्रज्ञाला एका मुलाखतीत विचारण्यात आलं

की, 'तुम्ही जर मानव नसता, तर कोणत्या प्राण्याचा जन्म घेणं तुम्हांला आवडलं असतं ?

त्यावर स्केफ म्हणाला,

'मला कालव-शिंपला (ऑइस्टर) व्हायला आवडेल.'

हे त्याचं उत्तर ऐकून परीक्षकाला आश्चर्य वाटलं. त्यांनी विचारलं,

'का बरं?'

'कारण कालव-शिंपल्याच्या जीवनाला नर म्हणून सुरुवात होते. नंतर त्याचं रूपांतर मादीत होतं अन् शेवटी तो अर्धनारीनटेश्वर होतो. जीवनाच्या सर्व थरांच्या अनुभवांतून तो जातो. त्यामुळं संपूर्ण जीवनाविषयीचं ज्ञान त्याला अवगत होतं.'

परीक्षकांना हे उत्तर आवडलं,हे सांगायला नकोच.


(हा लेख लिहीत असताना आमचे परममित्र माधव गव्हाणे सरांचा फोन आला आणि याच अनुषंगाने थोडी नवीन चर्चा झाली त्यातून नवीन माहिती मिळाली.वानरे संत्री खात नाहीत.कारण ती सोलत असताना संत्र्याच्या सालीमध्ये असणारा रस डोळ्यात उडतो,व डोळे चरचरतात,हे ज्ञान त्यांनी अनुभवातून मिळवलेले आहे त्यामुळेच वानरे संत्री खात नाहीत.)


सर्वांचे पुनश्च आभार व धन्यवाद


● विजय कृष्णात गायकवाड

१५/११/२२

'निसर्गाची नवलाई' मध्ये जाणून घेऊया पक्षी भाग -१

उत्क्रांतीतल्या व जीवशास्त्रातल्या अभ्यासकांच्यामते या जगातील सगळ्यात प्रगत प्रजाती ही 'पक्षी' आहे.


मेंदूचा आकार,पखांची ठेवण यांच्या क्षमता पाहील्या तर आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही.एवढ्या छोट्या मेंदूमध्ये जीवन जगण्याच्या नोंदी कशा काय राहू शकतात? एवढ्याशा पखांचा उपयोग करुन फारच दुरचा प्रवास कसा काय करु शकतात?म्हणजेच पक्षी हा उत्क्रांत आहे याची खात्री पटू लागते.


पक्ष्यांचे अन्नशोधाचे कौशल्य लांब अंतरावरचे अचूक स्थलांतर पाहिले.तर त्याच्या बुद्धिमत्तेला नावे ठेवता येणार नाहीत पक्ष्यांना किचकट गोष्टी शिकवता येतात तर काही पक्षी न शिकवता बाह्यसाधने वापरून शिकतात.


एखादी अळी वा फुलपाखरू खाल्ल्याने त्रास होतो हे लक्षात आल्यावर पुन्हा त्या अळी वा फुलपाखराला तोंड लावत नाहीत.काही भडक रंग धोकादायक असतात हेही त्यांना अनुभवाने कळते.हेरिंग गल पक्षी सिंपले चोचीत घेऊन उंच जातात व त्या शिंपा दगडावर आपटतात तेव्हा त्यातून कालव खायला मिळतात हे त्यांना समजते.


जपानमधील काही शहरातील कावळे रस्त्यावरच्या रहदारीचे दिवे लाल असताना तिथे अक्रोड टाकतात.हिरवे दिवे लागले की रहदारी सुरु होऊन अक्रोड फुटतात.पुन्हा दिवे लाल झाले की रहदारी थांबल्यावर ते तुकडे गोळा करतात.यावरुन त्यांची निरीक्षणशक्ती लक्षात येते.(पक्षीगाथा या पुस्तकातील नोंदी)


हेरॉन नावाचा एक पक्षी आहे.तो बगळ्यासारखा साधारणत: दिसतो.पांढरा हेरॉन व काळा हेरॉन आहेत.त्यापैकी काळा हेरॉन हा आपलं खाद्य कशाप्रकारे मिळवितो.(यासंदर्भात व्हिडीओ आहेत.) 

हा पक्षी मासे धरण्यासाठी वाहणाऱ्या पाण्यात किंवा पाण्याजवळ जाऊन तिथे तो आपल्या पंखाची छत्री तयार करून सावली तयार करतो.मासे सावली आली म्हणून तिथे येतात आणि नेमक्या वेळी त्यातील एक मासा तो उचलतो,आणि खावून टाकतो. गमंतीशीर पण शिकण्यासारखी गोष्ट आहे


त्यानंतर पांढरा हेरॉन हा जरा जास्तच हुशार आहे. हा काय करतो,तर खाण्याचा एखादा पदार्थाचा तुकडा पाण्यावरती टाकतो.व तो खाण्यासाठी ज्यावेळेला मासे येतात त्यावेळी त्यातला एक मासा तो उचलतो आणि खाऊन टाकतो.


आणखी एका व्हिडीओच्या संदर्भानुसार सतिश खाडे याला कोथरुडचा पांढरा हेरॉन म्हणतात.कारण हा जरा इतरांच्यापेक्षा 'वेगळा विचार करणारा'आहे. तर हा काय करतो.कुठून तरी थर्माकॉलचा एक तुकडा आणून तो पाण्यात टाकतो,त्या पाण्यातील माशांना वाटतं.की हे काहीतरी अन्न आहे,आणि ज्या वेळेला तो तुकडा खायला मासे येतात.त्या वेळेला तो त्यांची शिकार करतो. तो थर्माकॉलचा तुकडा तो तसाच जपून ठेवतो. खाऊन झाल्यानंतर परत निवांतपणे तोच तुकडा टाकून तो अशा पद्धतीने दररोज शिकार करतो.


कावळा आपल्या सर्वांना माहीत असणारा जवळचा व सुपरिचित असा आहे,त्यामुळे त्याचा जास्त अभ्यास केला गेलेला आहे. त्याला अभ्यासाअंती बुद्धिमानही

म्हटलेलं आहे.त्यातील काही प्रयोग..


एकदा काय झालं कावळ्याला आवडणाऱ्या मांसाचे तुकडे एका दोरीला बांधून झाडाच्या फांदीला अडकून ठेवले.आता अडकून ठेवल्यामुळे ही दोरी मागे पुढे होत होती कावळ्याने ते बघितले आणि त्याने दोरीवरील मांसाला टोच मारून खात्री करून घेतली. त्याने बराच वेळा टोच मारून ते खाण्याचा प्रयत्न केला पण ते थांबत नव्हते.मग त्यांने थोडा थांबून विचार केला.

आणि एक भन्नाट कल्पना त्याला सुचली.त्याने मग काय केले तर एका पायाने ती हलणारी दोरी वर ओढून घेतली. (जशी आपण आडातून पाण्याची घागर वर ओढतो तशी) आणि मग निवांतपणे त्यांने ते मांस खाल्ले..


ज्या वेळेला आपण आरशामध्ये बघतो त्यावेळेला आरशामध्ये दिसणारी वस्तू डावीकडे किंवा उजवीकडे अशी दिसते त्या ठिकाणी आपण गोंधळतो.कावळ्याच्या समोर आरसा ठेवण्यात आला.व त्याच्या मागच्या बाजूला त्याला आवडणारा मांसाचा तुकडा ठेवला.कावळ्याने आरशात तो तुकडा बघितला आणि मागे वळून त्याने तो चटकन खाऊन टाकला मागे वळून बघितल्यानंतर डाव्या बाजूला किंवा उजव्या बाजूला असा त्याचा गोंधळ झाला नाही. हे त्याच्या बुद्धिमत्तेचे उदाहरण आहे.


अभ्यासकांच्या अभ्यासानुसार माणसांच्या ७ वर्षाच्या मुलाला जेवढी बुद्धिमत्ता असते,बुध्यांक असतो.तेवढी बुद्धिमत्ता व बुद्ध्यांक कावळ्याला असतो.


काही पक्षांना आकडेसुद्धा मोजता येतात.जपान व चीनमध्ये मासेमारी करताना एका विशिष्ट लांब मानेच्या बगळ्यासारख्या पक्षाचा मासेमारीसाठी उपयोग करून घेतात.तो मासे पकडण्यामध्ये माहीर असतो. लहान नावेतून अशा दोन-चार पक्षांना ते घेऊन जातात.त्यांच्या लांब मानेमध्ये एक कडी अडकवली जाते,त्याने मासा खाऊ नये म्हणून,पण त्याने ७ मासे पकडून आणल्यानंतर तो मासेमारी करणारा माणूस त्या पक्षाच्या मानेमध्ये घातलेले कडी काढतो,आणि त्याला एक मासा खायला देतो.यात गमतीशीर भाग असा आहे,की ७ मासे आणल्यानंतर जर त्या माणसाने त्याची कडी काढून त्याला मासा खायला दिला नाही तर तो पक्षी मासे पकडण्यासाठी जातच नाही.म्हणजेच तो पक्षी आकडे ओळखतो त्याला आकड्याचे ज्ञान झालेले आहे.


हेमलकसा या ठिकाणी प्रकाश आमटे त्यांच्या घरी घडलेली घटना.. त्यांच्या घरी पाहूणे आलेले. प्रकाश आमटे यांच्या पत्नी मंदाकिनी आमटे यांची मैत्रीण त्यांना भेटण्याकरता आली होती. तर या ठिकाणी मंदाकिनी अंगणामध्ये बसल्या होत्या आणि त्यांची मैत्रीण घरातून त्यांच्याशी बोलत होती. एक दोन वाक्य बोलल्यानंतर काही वेळे शांततेत गेला आणि त्यांनी बोललेली दोन वाक्ये त्यांच्या आवाजात जशी आहेत तशी त्यांच्या कानावर आलीत. त्यांनी आजूबाजूला पाहिले पण त्यांना काही दिसलं नाही,त्यांना वाटले आपल्याला भास झाला असेल म्हणून त्या पुन्हा बोलू लागल्या.परत दोन-तीन वाक्ये बोलल्यानंतर त्यांच्या आवाजात हुबेहुब पुन्हा तीच वाक्ये त्यांना ऐकायला आलीत.आता मात्र त्यांना काही समजेना आसपास तर कोणी दिसेना,मग हे कोण बोलत आहे? त्या तशाच तडक बाहेर मंदाकिनी जवळ गेल्या आणि म्हणाल्या 'अगं या ठिकाणी कोणीतरी आहे जे माझ्या आवाजाची नक्कल करून बोलत आहे'.मला तर इथं कोणीही दिसत नाही,मला तर हा काहीतरी वेगळा प्रकार वाटतोय.त्यावर मंदाकिनी हसल्या,आपल्या मैत्रिणीला घेऊन आत गेल्या आणि म्हणाल्या ही गमंत आमच्या येथे येणाऱ्या जवळजवळ सर्व पाहुण्यांच्या बाबतीत घडते.घरात आल्यानंतर भिंतीवरती एका खुट्टीवर एक लहान मैना बसली होती.तिच्याकडे बघत त्या आपल्या मैत्रीणीला म्हणाल्या,ही मैना तुझी हुबेहूब नक्कल करते.आपल्याला फक्त मिठू मिठू पोपट माहीत असतो. पण माणसाच्या आवाजाची नक्कल करणारी जंगली मैना माहीत नसते.


'निसर्गाची नवलाई' या सतीश खाडे यांच्या पाॅडकास्टमधून..

विजय कृष्णात गायकवाड

१३/११/२२

प्रेम जाणून घेताना..

खरे प्रेम तसे कठीणच असते. पण आपण ते अनुभवायला आतुर असतो.प्रेम हे जीवनात सर्वात महत्त्वाचे आहे. बाकी सर्व त्याच्या पार्श्वभूमीसाठी असते. प्रेम करणे हे निसर्गाने मानवावर सोपवलेले सर्वांत कठीण आणि सर्वात महत्त्वाचे कार्य आहे. तरुणाईला वाटते की प्रेम हा आपला प्रांत आहे,पण तरुणांची प्रेम करायची कुवतच नसते.आपल्या सर्वस्वानिशी प्रेम करायला शिकावे लागते. प्रेम म्हणजे दुसऱ्यामध्ये विरघळून जाणे किंवा स्वतःला समर्पित करणे किंवा एक होणे नव्हे ! कारण दोन अपूर्ण, स्वतःला नीट न ओळखणारी,एकस्पंद नसलेली माणसे एक कशी होतील ?


प्रेम हे तुम्हाला संपूर्ण परिपक्क करणारी गोष्ट आहे. स्वतः पूर्णत्वाकडे नेणारी,आपल्या आतील अवकाश असीम विस्तारणारी,दुसऱ्यासाठी अवघे विश्वच बनायची प्रेरणा देणारी बाब म्हणजे प्रेम !कधी कधी एका आयुष्यात ते पूर्णत्वाला जाईल असे नाही.प्रेम जीवनाचे अंतिम रूप आहे.तरुण माणसे प्रेमात स्वतःला विरून टाकतात. एकासाठी दुसरा मिटवून घेतो,अन् आपल्याबरोबर दुसऱ्यालाही अपूर्ण बनवतो.अशा तुकड्यातून कुणाला कसे काय पूर्णत्व मिळू शकेल? त्यातच आनंद मानून राहणाऱ्याच्या वाट्याला भविष्यात निराशा अन तिरस्कार हेच येईल. सामान्यांना त्यातच स्वर्ग आहे,असे वाटते,पण आपला आतील अवकाश,आपला सर्जनाला प्रेरक ठरणारा असीम एकाकीपणा कधीही मिटू देऊ नये. प्रेमाने त्याच्या या अवकाशाच्या कक्षा आणखी रुंदावायला हव्यात खऱ्या प्रेमात दोघांचाही विकास व्हायला हवा ! एकमेकांपासून स्वतंत्र, विकसनशील अन तरीही बंधनात असणे, ही भावना जाणवायला हवी !


'प्रेम' या मूल्याविषयी जर्मन कवी रिने मारिया रिल्के याने एका तरुण कवीला लिहिलेले पत्र..!


'अवेकन द जायंट विदिन मधून..'

११/११/२२

९ नोव्हेंबर २०२२ या लेखातील पुढील व शेवटचा भाग..

'पाण्याच्या बचतीचा टाटा पॅटर्न'


आम्ही पैसे भरतो पाण्याचे... हवे तेवढे वापरू... हवे तसे वापरू... अशी उद्दाम भाषा बऱ्याच वेळा ऐकायला मिळते.आणखी दुसरी बाजू... करोडो रुपये उलाढाल असलेल्या कंपन्यांमध्ये पाण्याच्या बिलाची रक्कम किती? त्याची किंमत ती किती ? हे दोन्ही विचार पूर्णपणे बाजूला सारून,पैसे भरले म्हणजे वाटेल तो हक्क मिळाला किंवा किंमत कमी आहे म्हणून त्यात काय वाचवायचे असा कोणताही समज करून न घेता पाणी वाचवणे ही सामाजिक जबाबदारी आहे आणि त्याची पैशात किंमत कमी असली तरी त्याचे मोल अमुल्य आहे.हे जाणून व्यापाराआधी समाज कल्याणाचे उत्तरदायित्व सांभाळणाऱ्या टाटा मोटर्स कार प्लांटमधील पाणी बचतीचे व पाणी पुनर्वापर संबंधित ही कंपनीतील ध्येयवादी पर्यावरण रक्षण विचाराने सांघिक कामगिरी केलेल्या विविध यशस्वी उपायांची ही कहाणी..!


गिरीश लिमये हे टाटा मोटर्स कार प्लांट इन्व्हरमेंट डिपार्टमेंट संबंधीत अधिकारी आहेत.....


आमच्या एन्व्हायरमेंट डिपार्टमेंटच्या मासिक बैठकीत लक्षात आलं की गेली दोन महिने कंपनीतील पाण्याची मागणी आधीच्या महिन्यांच्या आणि गेल्या वर्षाच्या तुलनेत खूपच जास्त आहे.आमचा दर दिवशीचा,दर महिन्याचा अन् दर वर्षीचा अनेक हिशेबापैकी एक 

म्हणजे पाण्याचा हिशोब! दर दिवशी किती पाणी लागले? प्रत्येक कार मागे किती पाणी लागले? त्याची पैशात रक्कम किती? हे हिशोब करताना लक्षात आले की गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी रक्कम खूप वाढली आहे.कारखान्यातील प्रॉडक्शन तर नेहमी होते तेवढेच होते,कामगार व अधिकाऱ्यांची संख्या ही तेवढीच होती.मग इतकी पाण्याची मागणी का वाढली? याचा आढावा घेतानाच उच्च अधिकाऱ्यांनी इन्व्हारमेंट डिपार्टमेंटला सांगितले की पाणी वापर,पाणी मागणी आणि पाणी बिल कमी करायला हवे. सांगा या एक वर्षात तुम्ही मागणी किती टक्क्यांनी कमी करणार ?... कोण उत्तर देणार? शेवटी कोणी तरी पुटपुटत म्हटलं दहा टक्क्यांनी मागणी कमी करू!! 


मीडियम स्केल व लार्ज स्केल कंपन्यामध्ये ईतर अनेक डिपार्टमेंट बरोबरच एक इन्व्हरमेंट डिपार्टमेंट असते.त्यांना कंपनी संबंधित पर्यावरणाच्या अनेक गोष्टी कराव्या लागतात. त्यात (हजार्डस् वेस्ट डिस्पोजल) विघातक कचऱ्याची विल्हेवाट,एस.टी.पी.व ई.टी.पी. यांच्या कामाचे नियंत्रण,दुरुस्ती,उभारणी हे महत्त्वाचे काम असते.कंपनी कँटीनच्या उरलेल्या अन्नाची विल्हेवाट,तसेच कंपनीतील हवेची गुणवत्ता व कंपनीतून बाहेर पडणाऱ्या हवेत मिसळणाऱ्या विविध घटकांचे प्रमाण यावरचे नियंत्रण व कार्यवाही ही महत्त्वाची कामे असतात.त्याचबरोबर सर्वप्रकारे वापरायच्या पाण्याची गुणवत्ता आणि सांडपाण्याची योग्य विल्हेवाट ही संवेदनशील कामे या विभागाकडे असतात.या सर्व गोष्टींच्या नोंदी ठेवणे,त्यांची माहिती आपल्या व्यवस्थापनाला व विविध सरकारी,निमसरकारी सरकारी संस्थांना पाठवणे, तसेच सर्व प्रकारचे कायदेशीर पत्रव्यवहार ठेवणे ही ही कामे या विभागाची असतात.


पण सध्या तरी सर्वात महत्त्वाचा संवेदनशील विषय म्हणजे पाणी आणि सांडपाणी !! तर वरिष्ठ साहेबांचा सर्वांसमोर विषय चालू होता. वर्षाआड दुष्काळ आणि पाण्यावर चर्चा,जगात चालू आहे.त्यांनी सांगितले दहा टक्के पाणी वापर कमी करणे हे काही चॅलेंजेस होऊ शकत नाही ते म्हणजे सहज होणारे आहे!! आव्हान नेहमी मोठे असावे, आव्हान आव्हान वाटले पाहिजे!! तरच माणूस झगडतो... घ्यायचं तर निम्मे पाणी वाचवू असे काहीतरी घ्या वगैरे वगैरे, सगळं इन्व्हरमेंट डिपार्टमेंट डोक्यावर डोंगर पडल्यासारखे एकमेकाकडे पाहायला लागले. पण साहेबांसमोर बोलणं शक्य नव्हतं. हो म्हणण्याशिवाय पर्याय नव्हता. हे कसं काय शक्य होईल..!


तीन महिन्यानंतर पहिला रिपोर्ट द्यायचा होता. आता प्रत्येक कार मागे जेवढं पाणी लागत होतं. ते आता आम्हाला निम्म्यावर आणायचं होतं. आता हे फक्त इन्व्हारमेंट डिपार्टमेंटच्या आटोक्यात येणारं काम नव्हतं.आता कार प्लांटमधील सर्व शॉप्स म्हणजे लोअर शॉपमधून पाणी-पर्यावरणप्रेमींचा एक गट स्थापन करायचं ठरलं!!


टाटा मोटर्स म्हणजे पूर्वीची टेल्को ही अकराशे एकरमध्ये वसलेली.कंपनीचा कार प्लांट हा साधारण 'तीनशे एकरात'व्यापलेला विभाग आहे.तिथे सगळे मिळून सात हजार लोक काम करतात.येथे सर्व प्रकारच्या टाटा ब्रँडच्या कार्स बनवल्या जातात.तर ह्या पाणी टीममधील लोक त्यांच्या नेहमीच्या कामाव्यतिरिक्त हे पाण्यासाठी काम करणार होते. याला क्रॉस फंक्शनिंग टीम असे नाव दिले. या टीममध्ये सिव्हिल आणि बांधकाम डिपार्टमेंट आणि फायनान्स डिपार्टमेंटला आवर्जून घेतले. प्लंबिंग आणि इतर तत्सम कामासाठी कन्स्ट्रक्शन डिपार्टमेंट आणि सर्वच आलेल्या गोष्टी फायनान्स डिपार्टमेंटला माहित असतील तर बजेट मंजूर करायला अडचण नको म्हणून फायनान्स डिपार्टमेंट,आता काम सुरू झाले.... एकेक शॉपच्या पाण्याचा हिशोब मांडणे व तपासणी करणे सुरू झाले. यातून सगळ्यात जास्त पाणी लागणारे ते सगळ्यात कमी पाणी लागणारे अशी क्रमवारी ठरू लागली.पहिल्या नंबर होता पेंट शॉपचा !! तो सर्वात जास्त पाणी संपवणारा,वापरणारा होता !! सर्वात जास्त पाणी का लागते ? आता एकेक गोष्ट तपासण्यास सुरुवात झाली.लक्षात आलं की एक जुनी पाईपलाईन व एक नवीन पाईपलाईन आहे.जुनी पाईपलाईन आणि त्याचा व्हाल्व चालू आहे.ते पाणी कुठे जाते हे कळत नव्हते. वापरले तर जात नव्हते. लगेच पाईप लाईन बंद केली.याने चक्क अडीच ते तीन लाख लिटर पाणी वाचू लागले..... ही एक नवीन दिशा देणारी गोष्ट होती!!


आता प्लांटमधील सर्वच पाईपलाईनचा सर्वे सुरू झाला.त्यांचे नियोजन व निरीक्षण व सुरू झाले. मग एकेक गोष्ट सापडत गेली.अशीच एक मोठी गोष्ट आढळली.कुलिंग टॉवरला पाणी सर्क्युलेट व्हायला हवे होते.पण तिथला रिटर्न हॉल बंद होता आणि पाणी परत परत वापरले जाण्याऐवजी ते बाहेर जाऊन एटीपीला जाऊन मिळत होते. तो पण व्हाल्व बदलला न् एक ते दीड लाख लिटर पाणी वाचायला लागले.


अंडरग्राउंड पाणी वॉटर लाईन्स चेक केल्या तर त्यांची गळती बऱ्याच प्रमाणात होती.मग दुरुस्ती किंवा नवीन पाईप टाकले. तिथेही हळूहळू एकेक करून एक ते दीड लाख लिटर पाणी वाचायला लागले.पाईपलाईनचे हे सर्व प्रकारचे काम हाताळून झाले.त्यात बरेचसे यश हाती लागले.आता एकेका शॉपमधील पाण्याच्या वापराकडे वळलो.एक JLR नावाचं शॉप आहे, तिथे गाडी धुतली जाते. ती माणसांनीच धुवावी लागते.तेथील सुपरवायझर व कामगाराशी चर्चा केली.त्यांचे समुपदेशन केले.गाडी स्वच्छ सुंदर धुवा,हयगय नका,पण अशा अशा पद्धतीने पाणी वाचवणे शक्य आहे.हे हे करा,यासाठी त्यांना एक चेकलिस्ट दिली.त्याप्रमाणे त्यांचे बिहेविअर चेंजिंग आणि प्रिसिजन वर्किंग हे अगदी गाडी धुण्याच्या कामातही शक्य आहे,हे त्यांना व आम्हाला ही उमगले. त्या शॉपला रोज एक लाख लिटर पाणी वाचायला लागले. 


आतापर्यंत आम्ही तर निम्मी लढाई जिंकली होती.टारगेट ठरवलं होतं.त्याच्या निम्मे पाणी आम्ही आता वाचवू लागलो होतो.आमचा आत्मविश्वास दुणावला,उस्ताह वाढला.यापूर्वीचे रेकॉर्ड तपासले असता प्रत्येक कार बनवण्यासाठी लागलेले कमीत कमी पाणी किती त्यापेक्षा आम्ही बराच खाली आणला होता पाणी वापर..!


आमचे टीम वर्क सुरू होते.आता आमचा टिम मेंबर प्रत्येक शॉपमधील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पाणी संवर्धन हा विषय घेऊन पोहोचला होता. कंपनीतल्या प्रत्येकाला या विषयात गुंतवायचे होते.त्यांच्या सूचना,त्यांच्या सवयी,नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर इत्यादी सर्वच बाबतीत त्यांच्यावर लक्ष द्यायचे होते.बऱ्याच वेळा आम्ही या कामातला वेळ ८० टक्के नियोजनामध्ये घालवला आणि प्रत्यक्ष कामाला त्यामुळे २० टक्के वेळ लागला.


आता प्रत्येक शॉपचा ही पाणीवापर महिन्यागणिक हळूहळू का होईना कमी होऊ लागला.


प्रत्येक शॉपच्या टॉयलेट ब्लॉकची जबाबदारी एकेका लीडरला दिली.ती त्या कुठल्याही लिकेजसाठी,कोणत्याही सूचनेसाठी, सुधारणेसाठी त्यांनी जबाबदारी स्वीकारली होती. दरम्यान आम्ही पूर्ण प्लांटमधील सर्वांसाठी खुली पाण्याविषयीची घोषवाक्यची स्पर्धा ठेवली त्यास उत्स्फूर्त आणि मोठा प्रतिसाद मिळाला. या निमित्ताने आमची माहिती त्यांच्यापर्यंत अधिक कळकळीने पोहोचली.त्यांची विचारशक्ती काम करू लागली. आणि यातून त्यांची जागरूकता वाढली.


दरम्यान सर्व ठिकाणचे कॉक बदलण्यात आले. पूर्वीचे २१ सेकंद पाणी देण्याऐवजी आता अकरा सेकंद चालणारे कॉक बसवले गेले. आता त्यातून पन्नास टक्के पाणी वाचू लागले होते..


पाणी वाचवण्याचे प्रयत्न चालूच होते.त्याच बरोबर पाणी साठवणे,पाण्याचे शुद्धीकरण, सांडपाणी शुद्धीकरण आणि पुनर्वापर या माध्यमातूनही काही योजना हाती घेतल्या होत्या. त्यातून ही यश साधले.तसे झिरो डिस्चार्ज कंपनी म्हणून आम्ही २०१३ मध्येच त्या टप्प्यावर पोहोचलो होतो.पण आता आमचा पाण्याचा इन टेक वाढत होता.आजही आम्ही झीरो डिस्चार्ज स्टेटसमध्ये आहोत पण पाण्याची एमआयडीसीकडून खरेदी निम्म्यावर आली आहे.


पाणी साठवण्याचे उपाय म्हणजे रेन वॉटर हार्वेस्टिंग !! ही सिस्टिम पूर्वी काही प्रमाणात उभारली होती पण ती वापरली जात नव्हती. त्याकडे चुकून अनेक वर्ष दुर्लक्ष झाले होते.मग त्यासंबंधीचे सगळेच बिल्डींग ड्रॉइंग,पाईपलाईन लेआउट वगैरेचा अभ्यास करण्यात आला व शक्य तिथे शक्य ते दुरुस्त केले.तर काही ठिकाणी समांतर नवीन पाईपलाईन टाकली,पावसाळ्यात तीन महिने हे पावसाचे पाणी साठवण्याची आमची क्षमता इतकी आहे की त्यातून सर्व प्लांटची पिण्याच्या पाण्याची गरज भागेल.


पावसाळ्यातील या तीन महिन्यातील एमआयडीसीकडून विकत घेत असलेल्या पाण्याची मागणी इतकी कमी झाली की तीन महिने मिळून तीस टक्के पाणी बिल वाचले!! पाणी साठवणूक रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या माध्यमातून अजून वाढविण्याचे नियोजन सुरू आहे.त्यासाठी भूगर्भातील पाणी साठवणुकीसाठी योग्य खडक याचा शोध घेऊन म्हणजेच अॅक्विफर मॅपिंग करून आणि रिचार्ज झोन ठरवून जिथून पाणी उत्तम रीतीने जमिनीत जीरु शकणार आहे.हा भाग शोधून जास्तीत जास्त पाणी जमिनीत मुरून पाण्याबाबत स्वयंपूर्ण व्हायचे स्वप्न आहे.त्यामुळे आणखी ही एक मोठे स्वप्न साकार करता येईल ते म्हणजे टाटा मोटर्स कार प्लांट निसर्गातून जेवढे पाणी वापरण्यासाठी घेते तेवढे किंवा त्यापेक्षा थोडे का होईना अधिक पाणी निसर्गाला परत देण्याची सोय करणे.


तो टप्पा ही लवकरच पार करू असा विश्वास टाटा मोटर्सच्या एन्व्हारमेंट टीमला नक्की आहे.


या टीमने मध्ये तयार झालेल्या सांडपाण्याचा पुनर्वापर यावर ही बरेच काम केले आहे. ईटीपीच्या माध्यमातून सांडपाण्यावर प्रायमरी व सेकंडरी ट्रीटमेंट करतातच,पण tirsury म्हणजे थर्ड स्टेज ट्रीटमेंट व रिव्हर्स ऑस्मॉसिस ट्रीटमेंटमधून अधिकाधिक स्वच्छ पाणी मिळवले जाते.इंडस्ट्रीतील ट्रीटमेंट प्लांटमधील आर.ओ. प्लांट हा पिण्याच्या पाणी मिळवण्याकरता असणाऱ्या प्लांटपेक्षा वेगळा असतो.म्हणजे यातील फिल्टर मेंब्रेन वेगळ्या वैशिष्ट्यांनी युक्त असतात व मेम्ब्रेन संख्येने पण जास्त असतात. त्या मेंब्रेन्सच्या किमतीही खूप जास्त असतात. त्याचबरोबर त्यांचे आयुष्यही तुलनेने जास्त असते.


तर ह्या प्लांटमधून बाहेर पडणारे पाणी पेंट शॉपमध्ये वापरतात.पेंट शॉपमध्ये काही केमिकल्स बनवण्यासाठी मिनरल वॉटर लागते, ते ह्या आरो प्लांटमधून उपलब्ध होते. या प्रक्रियेमुळे उपलब्ध होणाऱ्या पाण्यामुळे रोज ७ ते ८ लाख लिटर पाणी दर दिवशी वाचू लागले. विविध शॉपवर ठिकाणी स्वच्छतेसाठी लागणारे पाणी ही आम्ही यातलेच वापरतो.


या प्लांटमधला निघणारा गाळ निघतो त्यातील पाणी काढून टाकतो. त्याला विशिष्ट मशिनने गरम करून वाळवतो.


या सर्व कामापलीकडेही आमचे अजून प्रयत्न असणार आहेत.नवनवीन कल्पना,तंत्रज्ञान, लोकसहभाग यांचा वापर करून पाण्याची मागणी कमी कशी करता येईल असेही आमची टीम म्हणते.


Waterless Urinals, E.T.P. मधील काही पर्यायी प्रक्रिया आणि रेन वॉटर हार्वेस्टिंग यातून आम्ही आमच्या ध्येयाच्या बरेच पुढे जाऊ असाही आत्मविश्वास आहे.


याबरोबरच सहा हजार लोक रोज कंपनीत जेवतात.त्या किचनचे किचन वेस्ट ही पाणी खराब/प्रदूषित करणारा घटक आहे.त्याची विल्हेवाट लावणे ही कंपनीची जबाबदारी आहे. त्यावर उपाय म्हणून आम्ही त्यातून बायोगॅस बनवता येईल असा मोठा प्लांट उभा केला आहे. कॅन्टीनमध्ये स्वयंपाकासाठी या बायोगसचा उपयोग होतो.


" संगणके जेउते नेले "


'माळ्याच्या मळ्यामधी पाटाचे पाणी जाते' हे आपल्याला ठाऊक असते.पण आताच्या काळात पाटापाटातून झुळझुळ पाणी नेलंय नव्हे तर शेतीला,बागेला पाणी किती व कधी द्यायचे नियोजन संगणक करतो.इंटरनेट ऑफ थिंग ही ह्या दशकाची क्रांतीच,भारतात इंटरनेट ऑफ थिंगचा वापर शेतीसाठी पाणी नियोजना करिता व व्यावसायिक तत्वावर पहिल्यांदा केला तो चक्रधर बोरकुटे यांनी..!


चक्रधर नागपूरच्या रायसोनी कॉलेज मधून २००३ मध्ये इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअर झाला. आवडीचा विषय आणि त्यात चांगली गती होती तरी नोकरीसाठी पुण्यात आल्यावर पहिली नोकरी करावी लागली ती बँकिंग मार्केटिंगची. काही काळातच त्यात चांगला जम बसवला.हे चांगले चालू लागले होते पण इलेक्ट्रॉनिक संबंधित काम करण्याचा निश्चय मनात कायम होता.इलेक्ट्रॉनिक्समध्ये कामाची संधी एकदा आली पण पगार अगदी नगण्य म्हणावा असा होता.पगारापेक्षा महत्वाचे वाटले ते आपल्या ज्ञानाचा व्यवहारात करता येवू शकणारा उपयोग आणि त्यातून मिळणारा आनंद.... मग मनावर घेतले आणि भविष्य घडविण्याचे काम आत्मविश्वासाने सुरू केले.बँकिंग मार्केटिंगच्या काळातच एका सॉफ्टवेअर कंपनीत ही काम केले होते.पगार व आर्थिक प्रगतीसाठी तेव्हाही आणि आताही सॉफ्टवेअर ही सर्वात चांगली संधी समजली जाते.पण चक्रधर तिथे रमला नाही.थोडा अनुभव पोतडीत भरून घेतला.


तो एका इलेक्ट्रोनिक चीप्स डिझाईन करण्याच्या कंपनीत काम करू लागला.मेहनती चक्रधर वर मालकाचा विश्वास बसला.इलेक्ट्रॉनिक हार्डवेअर व सॉफ्टवेअर डिझाईन करणारी ही कंपनी मालकाने एक दिवस अचानक चक्रधरलाच चालवायला दिली.मालक स्वतः बेंगलोरला तिकडे खूप काम असल्यामुळे निघून गेले.


मग या कंपनीचे सर्व नियोजन चक्रधर कडे आले.त्याची चीप्स डिझाइन बरोबरच विवेक सावंत सरांच्या एमकेसीएल बरोबर ट्रेनिंग प्रोग्रामची ही कामे चालू होती. काही कंपन्यांसाठी ऑटोमेशन चे काम होते ते केले. त्याच दरम्यान एका गृहप्रकल्पाचेही सिक्युरिटी साठी ऑटोमेशनचे काम केले.असे विविध स्तरावर विविध प्रकारचे काम सुरू होते.


दरम्यान २००९ मध्ये विवाह झाला.सौ.चेतना याही इलेक्ट्रॉनिक्स इंजीनिअरींगच्या पदवीधर असल्याने तर त्यांच्या कंपनीची टेक्निकल बाजू अधिकच भक्कम झाली.त्यांचे एक मित्र प्रशांत पाटील हेही त्यांच्या सल्लागाराच्या भूमिकेत तेव्हापासून आजपर्यंत आहेतच.


रेल्वे मंत्रालयाबरोबर रेल्वेसाठी विविध इलेक्ट्रॉनिक्स ऑटोमेशनच्या यंत्रणांची ऑर्डर चक्रधरच्या कंपनीला २०१५ मध्ये मिळाली होती.त्यानिमित्ताने रेल्वे अधिकाऱ्यांच्या सतत भेटी होत असत.तिथेच लुपिन फाऊंडेशनच्या योगेश प्रभूंची भेट झाली.योगेश प्रभू यांच्याशी चर्चा करताना शेतीमधील इलेक्ट्रॉनिक्स व आटोमेशन याबद्दलही चर्चा झाल्या.योगेश प्रभू आणि त्यांचे लुपिन फाउंडेशन हे समाजकार्य म्हणून ग्रामविकास आणि त्यातही विशेषतः शेती व शेतकरी विकासाविषयक खूप कामे करत असल्यामुळे शेतीतल्या गरजा काय आहेत हे त्यांना चांगलेच ठाऊक आहेत.चक्रधर विविध सेन्सर बनवतात व त्यावर आधारित अनेक यंत्रणाही,त्या प्रगत राष्ट्रांमध्ये मोठमोठ्या कंपन्यांसाठी बनवतात,हे योगेश प्रभू व त्यांचे वरीष्ठ श्री.रावसाहेब बढे यांना समजल्यापासून शेतीसाठी असे काही संवेदक विकसित व्हायला हवे हे वाटत होते.विशेषतः योग्य इरिगेशन सिस्टिमसाठी,या विषयीची चर्चा चक्रधर बरोबर झाली आणि त्यातून कल्पना पुढे आली की सिस्टीम आणि जमिनीतली आर्द्रता संवेदकाने मोजणे व त्याआधारावर पिकांसाठी सिंचन करणे हे काम व्हायला हवे.हे आपली कंपनी हे काम करू शकते चक्रधरांच्या लक्षात आले. चक्रधर,त्याचा मित्र प्रशांत पाटील व पत्नी चेतना यांनी भरपूर अभ्यास करून विविध प्रयोग करून पूर्ण स्वयंचलित सिंचन व्यवस्था शेतीसाठी विकसित केली. त्यात इलेक्ट्रॉनिक व I.O.T (Internate of Things) चा उत्तम मिलाफ आहे. पिकांना योग्य प्रमाणात पाणी देणे हे तसे खूप आव्हानात्मक काम आहे आणि त्यासाठी ही स्वयंचलित सिंचन व्यवस्था पूर्णपणे उत्तर ठरते. आपण यासाठी आधी पिकांना योग्य प्रमाणात पाणी म्हणजे काय याविषयी चर्चा करू म्हणजे ते लक्षात येईल.


योग्य प्रमाणात पाणी म्हणजे नक्की काय व किती यासाठी काही माहिती आधी मांडावी लागेल.जमिनीवरील पिकांची वाढ ही प्रामुख्याने जमिनीखाली मुळांच्या वाढीवर अवलंबून असते. मुळे सजीव असल्याकारणाने पीक वाढीच्या काळातील शोषून घेत असताना श्वसनही करत असतात.मात्र त्यासाठी जमिनीत पाणी व हवा यांचे योग्य संतुलन असणे आवश्यक असते. जमिनीतील हवा व पाण्याच्या समतोल असण्याला वापसा म्हणतात.ही वापसा अवस्था जेवढे जास्त काळ पिकाच्या वाढीस दरम्यान राहील तेवढे पीक जोमदार येते.जमिनीत पाणी जास्त असेल परंतु पिकास शोषून घेता येत नसेल तर झाडाची पाने पिवळी पडतात,त्यांची वाढ खुंटते,हीच अवस्था जास्त काळ राहिली तर पीक मरते देखील,तसेच या उलट जमिनीत पाणी कमी राहिले,हवा जास्त राहिली तर पिकास पाणी कमी पडते.अन्नद्रव्य कमी पडत जातात.पाने कोमेजतात,पीक वाळू लागते आणि ही अवस्था जास्त काळ राहिली की पीक मरते.


पीकाच्या उत्तम वाढीसाठी जमिनीतून झाडाद्वारे पाण्याचे योग्य प्रमाणात शोषण होणे आवश्यक असते.त्यामुळे जमिनीत सेंद्रिय घनपदार्थ ५० टक्के,पाणी २५ टक्के आणि हवा २५ टक्के असे संतुलन आवश्यक असते.जमिनीतील किंवा शेतीतील पाणी नक्की कुठे कसे असते तेही थोडक्यात पाहू.जमिनीत मातीचे कण एकमेकांच्या जवळ येऊन समूह निर्माण करतात या मांडणीला मृदेची किंवा मातीच्या कणांची रचना असे म्हणतात.मातीच्या कणांच्या बारीक वालुकामय किंवा मध्यम जाड आकारावरून व प्रमाणावरून जमिनीचे वर्गीकरण ठरवतात.त्यालाच जमिनीचा पोत असे म्हणतात.जमिनीच्या पोतावर पाण्याची जलधारणाशक्ती,पाण्याची वाहकता जमिनीतील सूक्ष्म कृमींची (उपयुक्त बॅक्टेरीया) वाढ अवलंबून असते. जमिनीतील किंवा मातीतील पाणी तीन प्रकारचे असते.मातीच्या कणाने शोषलेले पाणी, मातीच्या कणांच्या भोवतीच्या पोकळीत साठलेले पाणी आणि खाली खाली जाणारे मुक्त पाणी…


जमिनीची सच्छिद्रता म्हणजे माती कणांच्या आकारमान व त्यांची रचना यावर साधारणतः ५० टक्के इतकी असते.जमिनीच्या हलक्या भारी प्रतवारीप्रमाणे ती कमी जास्त होते.


या सर्व गोष्टीची व्यवस्थित माहिती,त्यांचे शास्त्रीय ज्ञान,पिकाच्या वाढीची अवस्था, त्या त्या वेळी त्या त्या पिकाची पाण्याची गरज, तसेच हवामानातील ऋतूपरत्वे बदल यावर बदलणारी पाण्याची गरज,त्याप्रमाणे पाण्याचे मोजमाप या सर्व गोष्टी पाणी व्यवस्थापनासाठी अत्यावश्यक ठरतात.


आयओटीने जगात तिसरी क्रांती आणली आहे असे म्हटले जाते.पहिली औद्योगिक क्रांती,दुसरी संगणक क्रांती आणि तिसरी ही इंटरनेट ऑफ थिंग्सची क्रांती.यातूनच कृत्रिम प्रज्ञा म्हणजे आर्टिफिशिअल इंटेलिजन्स उगम झाला आहे. हे अगदी थोडक्यात सांगायचे तर स्वतः निर्णय घेणारा व त्यावर आधारित कृतीही करणारा संगणक !! यापूर्वीचे संगणक कसे आहेत ? तर त्यांना जे विशिष्ट काम करायचे आहे त्यासाठी खास प्रणाली (Software) विकसित करायची त्यात बाहेरून कोणी तरी माहिती भरणार (Data input) त्यावर कम्प्युटर किंवा संगणक निष्कर्ष देणार आणि त्यावर आधारित कृती परत माणसाला करावी लागणार.पण आता गेल्या दशकभरात हळूहळू अनेक क्षेत्रात आयओटीचा वापर वाढत आहे.सुरुवातीला फक्त उत्पादन क्षेत्रात येणाऱ्या कारखान्यातून यांचा वापर सुरू झाला.पुढे वैद्यकीय क्षेत्र व्यापले, आता वाहतूक क्षेत्र व्यापत चालले आहे आणि तो आता तर घराघरात येऊन पोहोचला आहे.शेतीसाठी आयओटी चा वापर सुरू आहे.पण भारतामध्ये तर बहुतेक बोरकुटे हेच पहिल्या पाच लोकांमध्ये असतील ज्यांनी तिचा वापर आपण शेती व सिंचनासाठी करूया असा विचार केलाय. किंबहुना आता तर ते पहिलेच आहेत सिंचनासाठी गेटवेचा वापर करून सिंचनाची सर्व यंत्रणा स्वयंचलित करून दाखवणारे! यात त्यांना त्यांच्या पत्नीची बरोबरीने साथ आहे. सौ. चेतना यांनी काही काळ पुण्यातील नामवंत इंजिनीअरिंग महाविद्यालयात प्राध्यापक म्हणूनही काम केले आहे.त्याच काळात त्या त्यांच्या विषयात सल्लागार म्हणून महाराष्ट्रभर प्रसिद्ध झाल्या.नंतर प्राध्यापिकेची नोकरी सोडून पूर्णवेळ कंपनीची मुख्य जबाबदारी सांभाळून लागल्या.संशोधन व उत्पादनाचे डिझाईन ही त्यांची महत्त्वाची जबाबदारी आहे.


या पाणी व्यवस्थापनातील यंत्रणेबाबत चर्चा करताना त्यांनी सांगितले की आमचे संवेदक पाचपट स्वस्त आहेत.पण त्याहीपेक्षा महत्वाचे म्हणजे ते सहजी कोणालाही हाताळता येतात, वापरता येतात.फूटभर उंचीचे हे संयंत्र जमिनीत नऊ-दहा इंच खोल रोवतात.वर एक डबी सारखा छोटा भाग असतो.त्यात बॅटरी असते.ही बॅटरी किमान तीन वर्षे टिकते.एका एकरासाठी दोन संवेदक पुरतात.संवेदक,गेट-वे व सॉफ्टवेअर हे सगळे मिळून एक एकरासाठी तीस हजाराची गुंतवणूक एकदाच होते.हे संवेदक काढून दुसरीकडे ही बसवता येतात.हे संवेदक जमिनीखालील नउ इंचापर्यंतची आर्द्रता सांगू शकतात.


फळपिकासारखा पिकांची मुळे अधिक खाली जात असल्याने तिथे काय करायचे असे विचारल्यावर त्यांनी सांगितले की फूट दीड फूट खड्डा करून तिथून खाली हे संवेदक रोवायचे.त्याला बाजूला थोडं संरक्षित करायचे.द्राक्षबागेत दोन-तीन ठिकाणी अशीच खड्डे घेऊन त्यात छोट्या बादलीच्या तळाला छिद्र पाडून त्या बादलीतून खाली नेऊन हे संवेदक रोवले. ही कल्पना शेतकऱ्यांचीच बरं का! ही यंत्रणा बाफना फार्म,केसनंद वाघोली (पुणे जिल्हा) येथे आणि मोहोळ तालुक्यातील एके ठिकाणी द्राक्ष बागायतीसाठी उभी केली आहे.तर जुन्नरला वैष्णव धाम (बुचकेवाडी) येथे फळबागेबरोबरच भाजीपाला आणि अगदी ज्वारीसाठीही ही वापरली आहे.या यंत्रणेमुळे सर्वोच्च काय साधले जाते तर ते म्हणजे प्रिसिशन इरिगेशन (Precision Irrigation) पाणी देण्यातली अचूकता.त्यातून पाण्याची वाढलेली उत्पादकता! 


'वर्तमान काळात सातत्याने जिवंत राहण्याचं सजग उद्दिष्ट बाळगणारी सामान्य व्यक्ती म्हणजे " संन्याशी " होय.'

( रास्ट ) 


खरचं हे कार्य नम्र होण्याचे 'शिक्षण' देवून गेले.


कोणत्याही प्रवाहापासून ३० मीटर बांधकामे असू नयेत,असा नियम असताना ओढ्यातच बांधकामे करण्यापर्यंत गोष्टी गेल्या आहेत. तसेच हे खूप कमी कालावधीत घडले,फक्त आठ - दहा वर्षात..बांधकामाचा म्हणजे जमीन,इमारतींनी व्यापलेला हा वेग निसर्गाचा पूर्ण विध्वंस करत गेला व जात आहे.


'पाण्याचा पत्ता सांगणारा माणूस'


डॉ. श्रीकांत गबाले म्हणजे पाण्याचा पत्ता सांगणारा व पाण्यापर्यंत पोहोचायचा नकाशा काढून देणारा माणूस.


पाणी व्यवस्थापन कुठलेही असो... छोट्या घरातलं,खेड्याचं,शहराचं,धरणाचं कालव्याचं, की पुराचं सुद्धा... आराखडे आणि नकाशाशिवाय काहीच करता येत नाही. एकावेळी दहा-दहा नकाशांचा संदर्भ द्यायचा आहे,हजारो रीडिंगची पडताळणी करायची आहे, अशा कामासाठी लागतात कम्प्युटरवर पाहता येतील असे नकाशे,त्यांचं आकलन उत्तम रीतीने करून त्यासाठी आवश्यक असलेल्या सॉफ्टवेअरमध्येही पारंगत होऊन पाणी विषयात अनेक विविध प्रकल्पांना सल्लागार म्हणून काम करणाऱ्या डॉ. श्रीकांत गबालेंची आणि त्या निमित्ताने भौगोलिक माहिती प्रणाली व दूरसंवेदन (Geographical Information system & Remote Sensing) या नवतंत्रज्ञानविषयीची ही कहाणी.....


खरंतर सुरुवातीपासून वसतिगृहात राहून शालेय शिक्षण पूर्ण करणारा श्रीकांत अकरावी शास्त्रसाठी मॉडर्न महाविद्यालयात आला. चुणचुणीत श्रीकांत अवांतर वाचनाच्या सवयीने पर्यावरणाबाबत हळवा झाला.आणि पर्यावरणात काहीतरी काम नक्की करायचं,तर भूगोलाचा अभ्यास करायला हवा... (खरंतर असं का वाटलं,की यासाठी भूगोलच घ्यायला हवा,याचं उत्तर आजही त्यांच्याकडे नाही...) पण ठरवून तो भूगोल विषय घेऊन बी.ए. झाला.खडक निर्माण शास्त्रातील पुढील शिक्षणासाठी एस. पी. कॉलेजमध्ये एम.एस्सी.ला प्रवेश मिळाला. (Geology यासाठी ही सोय आहे बी.ए. करून एम.एस्सी.ला प्रवेश मिळवता येतो.) खडक निर्माण शास्त्राबरोबरच बी.ए.फायनलला जीआयएस,आरएस हा विषय होता.नवीन तंत्र, संगणकचा वापर या गोष्टींमुळे आणि त्या विषयासाठी चांगले प्राध्यापक असल्याने त्यात श्रीकांत यांना जास्त रस वाटू लागला होता... एम.एस्सी.ला दुसऱ्या वर्षी प्रकल्प सादर करावा लागतो. खरंतर कॉलेज,विद्यापीठाने ही खूप उपयुक्त योजना विद्यार्थ्यांसाठी आखली आहे. आजवर घेतलेल्या ज्ञानाचा वापर,कौशल्यांचा वापर करत व्यवहारोपयोगी नवनिर्मिती करावी, त्यातून विद्यार्थ्यांच्या ज्ञानाचा,व्यक्तिमत्त्वाचा परिचय जगाला व्हावा हा उद्देश... पण फार थोडे विद्यार्थी या संधीचं सोनं करतात... बाकी सगळे टिक मार्क काम करतात.श्रीकांत ह्या थोड्या लोकांपैकी एक निघाला.प्रोजेक्टला काय विषय निवडायचा,ही चर्चा दुसऱ्या वर्षाचे कॉलेज सुरू झालं की सुरू होते.त्याच काळात बातम्या येत होत्या,कोकण रेल्वेच्या मार्गावर दरडी कोसळत आहेत.अशा दरडी कोसळण्याच्या घटना त्या वर्षी चार-पाच वेळा घडल्या.दरडी कोसळणे हा तर पूर्ण विषयच अभ्यासक्रमाचा,या विषयावरच काम करायचं,प्रोजेक्ट करायचं ठरले.त्यांच्या प्राध्यापकांनीही या विषयाला खूपच उचलून धरले.त्यावरच काम करण्यासाठी आखणी सुरू झाली. कागदावर काय करायचे, हे ठरवण्यासाठी आधी प्रत्यक्ष साईट व्हिजिट करणे आवश्यकच होते.मोठी दरड कोसळलेली 'कॉमेंट' गावात त्यांचे प्राध्यापक व वर्गमित्रांबरोबर साईट व्हिजिटसाठी श्रीकांत पोहोचले.तिथे मोठी रिटेनिंग वॉल बांधलेली होती,तिच्यासकट रेल्वे ट्रॅक मूळ जागेपासून ३२ फुटांनी सरकला होता. इतकी मोठी दरड कोसळली होती.या अनुषंगाने पुढे,मागे फिरून बाकी निरीक्षणही त्यांनी नोंदवले.मागे,पुढे बरेच बोगदे खणलेले होते. त्यांच्यावर जी गावं वसलेली होती त्यांच्या विहिरी आटल्या होत्या.जमीन कोरडी,नापीक झालेली होती.खूप विध्वंस झालेला होता निसर्गाचा... मग नकाशांचा अभ्यास झाला,पूर्वीचे जुने कागदावरचे नकाशे मिळवले गेले... ते जुळवले गेले,त्याचबरोबर सॅटेलाइट इमेजेसही तपासण्यात आल्या.त्यात पूर्वीच्या प्रवाहांचे ओढे,नाले,डोंगर,रस्ते,झाडे,प्रवाह त्यांचे आकार, आकारमान आणि दिशा तपासली गेली.दरड कोसळल्यानंतर प्रत्यक्ष परिस्थितीचे निरीक्षण केले.तेथील स्थानिक लोक व कोकण रेल्वेच्या कामासंबंधित लोक यांच्याशीही संवाद साधला. हा रेल्वेचा ट्रॅक डोंगराच्या तीव्र उतारावर होता. दरड कोसळली तिथून थोडेच पुढे दरीतील मोठा पूल होता. जो भारतातील दुसऱ्या क्रमांकाच्या उंचीचा होता... यावरून ट्रॅक किती उंचावर होता,याचा अंदाज येऊ शकेल. खूप तीव्र उतारावर ट्रॅकसाठी रुंदी मिळण्यासाठी बराच डोंगर तोडला होता.तसाच बराच भरावही घातला होता..!  ठिकठिकाणी डोंगराचे लचके तोडल्याने व भरावामुळे अनेक प्रवाह मधेच तुटले होते, गायब झाले होते,वळले होते.त्यामुळे पाऊस झाल्यावर ओढ्यातून वाहत आलेले पाणी भरावात मोठ्या प्रमाणात घुसले,त्याच्या दबावाने रिटेनिंग वॉलवरही दबाव आला आणि तीच सरकली... रिटेनिंग वॉल भरावाला धरून ठेवण्यासाठी असते,तीच सरकली.भरावही खचला आणि पाण्याच्या दबावामुळे सरकलादेखील... या सगळ्यांचा शास्त्रोक्त पद्धतीने अभ्यास करताना व खडक,माती, डोंगर,दरी,खाच-खळगे,ओढे-नाले या सर्वांचा संदर्भ घेताना,त्यांची मांडणी करताना भौगोलिक माहिती प्रणालीचा जॉग्रफिकल इन्फॉर्मेशन सिस्टीम व रिमोट सेन्सिंग प्रथमच खूप मोठ्या प्रमाणात वापर करायला मिळाला.खूप मूलभूत ज्ञान खूप पक्के झाले.त्या विषयाच्या या अभ्यासातून या वेळी श्रीकांत व त्यांच्या सहकाऱ्यांनी या समस्येचे उत्तर रेल्वेचा ट्रॅक बदलणे,म्हणजे दुसऱ्या सुरक्षित जागेतून हा ट्रॅक नेणे आवश्यक आहे,असा निष्कर्ष काढला. अर्थात हा विद्यार्थी व प्राध्यापक पातळीवरचा अभ्यास होता रेल्वे खाते किंवा सरकारी पातळीवर यावर आधारित निर्णय होण्यासारखा नव्हता.यावर श्रीकांत यांनी 'इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी'च्या राष्ट्रीय परिषदेत शोधनिबंध सादर केला.त्यावर परिषदेत खूपच चर्चा झाली... तसेच या निबंधाला राष्ट्रीय पातळीवर दुसरा क्रमांक मिळाला. या सर्व प्रकल्प व शोधनिबंधातही डॉ. मनोज नरवणे, विभाग प्रमुख प्रोफेसर डॉ. श्रीकांत कार्लेकर यांचे पूर्ण मार्गदर्शन होते. श्रीकांतजी त्यांचा उल्लेख खूप कृतज्ञतापूर्वक वारंवार करतात... पुढे नंतर शासनाने नेमलेल्या तज्ज्ञ समितीने अहवाल घेऊन कोकण रेल्वेचा ट्रॅक बदलण्याचा सल्ला दिला.यावरून श्रीकांत व टीमचा अभ्यास व निष्कर्ष यावर शिक्कामोर्तब झाले. नंतर लवकरच हा शोधनिबंध 'डेक्कन ग्राफ जिओग्राफी' या जगप्रसिद्ध जर्नलमध्ये प्रसिद्ध झाला... यामुळे या प्रकल्पाला प्रतिष्ठा लाभली. यातून पुढच्या आयुष्याची प्रेरणा मिळाली... आत्मविश्वास वाढला.... दिशाही ठरली... जीआयएस व आर. एस. क्षेत्रातच काम करायचे ठरले. विद्यार्थीदशेतच असे यश मिळू शकते, यासाठी पुस्तकी व कॉलेजमधला अभ्यास आवश्यक आहेच,पण समाजाला सुद्धा सतत वाचत राहिले पाहिजे.त्यामुळे लोकसमस्या, व्यावहारिक समस्यांची जाण होते.त्या समस्या आपल्या ज्ञानाच्या माध्यमातून सोडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला,तर आपण खऱ्या अर्थी शिक्षण घेतले असे वाटते... इतकेच नाही, तर यात आपल्याला व्यावसायिक व जीवन याचे मार्ग निश्चित करून यश मिळवता येते. फारच थोडे लोक असा पर्याय स्विकारतात.


काय आहे जीआयएस आणि आरएस ? त्याचा पाण्याच्या कामाशी कसा संबंध आहे? जॉग्रफिकल इन्फॉर्मेशन सिस्टीम ही प्रणाली म्हणजे पृथ्वीच्या पाठीवरील सर्व घटकांची माहिती टिपणे... ती साठवणे... ती विविध रूपांत उपलब्ध करणे... तीवर वेगवेगळ्या प्रक्रिया करणे... त्यातून विविध अर्थ लावणे... त्या माहितीचे नियमन करणे... या सगळ्यांना स्थळांचे संदर्भ असतात... या प्रणालीत सॅटेलाइट कॅमेरा,संवेदक,हार्डवेअर,सॉफ्टवेअर या सगळ्या गोष्टींचा समावेश होतो विशिष्ट स्थळ निश्चित करणे,स्थळाचे टिपण घेणे,स्थळांवरची हवी ती माहिती घेणे, स्थळांचा आकार-मोजमाप ठरवणे. तिची माहिती व तिचे ठिकाण याची नोंद घेणे, माहितीची आकडेवारी नोंदवणे... माहितीत होणारे बदल टिपणे, विविध नोंदी वेळेवर उपलब्ध करणे इत्यादी.


भूगोलात आपण सर्वात जास्त कशाच्या साह्याने अभ्यास करतो,तर नकाशाच्या साहाय्याने... कितीतरी प्रकारचे नकाशे, सर्व भाषा, नकाशांची.भूगोल म्हणजे..... जमिनीवरच्या सर्व गोष्टींचा अभ्यास... यात खडकांचा अभ्यास व खडकांचे नकाशे,त्यात खडकांच्या वयाचे नकाशे वेगळे, त्यांच्या प्रकाराचे नकाशे वेगळे... कोणत्या भागात कोणते खडक असे अनेक प्रकार... मग जमिनीवरचे डोंगर, पर्वत, दरी, चढ उतार हे सर्व नोंदवणारे नकाशे,अगदी प्रत्येक बिंदूची समुद्रसपाटीपासूनची उंची,त्यावर आधारित कंटूर नकाशा... मग फक्त जंगलाच्या क्षेत्राचे नकाशे,त्यात पुन्हा उपविभाग सदाहरित जंगले,कुरणे,खुरटी जंगले इत्यादी,हवामानाच्या विविधता दाखवणारे नकाशे,पिकांचे स्थळे दाखवणारे नकाशे,खाणी कुठे कुठे आहेत त्याचे नकाशे,कोणते प्राणी कुठे सापडतात त्याचे नकाशे... महत्त्वाचे म्हणजे देशाच्या राज्यांच्या सीमा दाखवणारे... रेल्वे, रस्ते, विमान मार्ग, लोकसंख्या,लोकसंख्येवर आधारित असलेली सर्व माहिती, वेगवेगळी माहिती दाखवणारे... सगळी सगळी माहिती नकाशाद्वारे नोंद करता येते.ही सगळी माहिती आणि नकाशे लोकांच्या विविध सोयी,सुविधा यांच्या व्यवस्थापनासाठी घेतले जातात.आणि यातून खूप मोठ्या उलाढाली होत असतात..... यातील एकेका भागात हजारो उपविभाग, त्यातून माहिती... आणि माहिती... आणि माहिती... सर्व माहितीच्या साठवणुकीसाठी कम्प्युटरचा वापर सुरू झाला, १९६० मध्ये रॉजर टॉमजिन्सन याने सर्वप्रथम ही कल्पना मांडली,अस्तित्वात आणली,त्यांना जीआयएसचा जनक असे म्हणतात.


पंधराव्या शतकात नकाशा विषयावर विचाराने काम होऊ लागले.... युरोपातील दर्यावर्दी विविध विभागावर पोहोचू लागले... तिथे जाण्याचा मार्ग लक्षात ठेवून तो कागदावर उतरवू लागले.... युरोपातील राजांनी त्याचे महत्त्व ओळखले. त्यांनी या प्रक्रियेला प्रोत्साहन दिले.पुढे एकेक करून एका भूभागावर युरोपातील एकेक देश हक्क निर्माण करू लागला.त्यातून जन्मले भूभागाचे मापन आणि त्यातून जन्मल्या कागदावरच्या सीमा... त्या सीमांनी बनवले नकाशे... सोळाव्या शतकाच्या अखेरीस देशांच्या सीमा सांगणारा जगाचा नकाशा पुसटसा जन्माला आला होता... त्यात सतत नवनवीन भर पडत राहिली.... आणि आज याच नकाशाशास्त्रावर पृथ्वीवरील ८०० कोटी लोकसंख्येचे व्यवस्थापन सुरळीत सुरू आहे. 


'आपल्या आजूबाजूच्या लोकांच्या संदर्भात आपण जितक्या जास्त प्रमाणात स्वतःची व्याख्या करू लागू तितके आपण अधिक हरवून जाऊ.' 


'संन्याशासारखा विचार करायला' लावणारं वाक्य खुपच अद्भुत


आणि या पुस्तकातील शेवटच प्रकरण..


'दुर्गंधी हरवणारा प्रसन्न माणूस'


पुण्यातील ओंकारेश्वर मंदिराजवळ रघुनाथराव केळकर यांच्या समाधीसमोरची पुण्याती टाकी गाळाने भरली होती.वर्षानुवर्षे दुर्गंधी भरून राहिली होती. परिसरात एके सकाळी काही तरुण-तरुणी कुदळ-फावडे घेऊन आले... टाकीतला जमेल तेवढा गाळ या तरुण-तरुणींनी काढला... या मंडळींचे नेतृत्व करीत असलेला तरुण इंग्लंडमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेऊन आला होता. सिंगापूरमधून त्याने डॉक्टरेट मिळवली होती. या चमूने येथे एक पान गवत लावले काही दिवसातच पाणगवत वाढले.आणि दुर्गंधी गायब झाली... कामाला सुरुवात केली तेव्हा हेटाळणी व विरोध झाला होता,पण आता कौतुक होऊ लागले... 'नदीची दुर्गंधी हरवणारा' म्हणून बातम्या प्रसिद्ध झाल्या... प्रसन्न जोगदेव त्यांच्या तंत्रज्ञानासह पर्यावरण क्षेत्रातला एक नायक झाला.


जसजसा निसर्ग अधिक बारकाईने कळू लागलाय गेल्या चाळीस-पन्नास वर्ष,तसतसा त्याच्याकडेच स्वतःच्या दुरुस्तीची कशी व्यवस्था आहे हे समजते आहे.जसं आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वगैरे विषय आपण अनुभवतोय तसंच पाण्यात येणारे गवतच पाण्याला शुद्ध ठेवण्यासाठीची निसर्गाची रचना आहे.याच तत्वावर आधारित पानगवताच्या माध्यमातून दूषित पाणी शुद्ध करता येते.याची विविध उदाहरणे निर्माण करून एक नवा पर्यावरणीय पर्याय देत असलेल्या प्रसन्न जोगदेव यांच्याबद्दल आणि त्यांच्या तंत्रज्ञानाबद्दलची ही कथा..!


डकवीड म्हणजे पाणगवताची एक जात. हे गवत बदकांना खूप आवडते म्हणून त्याला 'डकवीड' म्हणतात.आपल्याकडे अशा प्रकारच्या गवताला 'टिकली गवत' असेही म्हणतात.हे दिवसागणिक खूप वाढते, म्हणजे पाण्यावर आडवे पसरत जाते.पाण्यातील विरघळलेल्या व न विरघळलेल्या पाणी प्रदूषीत करणाऱ्या अनेक घटकांना मुळाद्वारे शोषून घेते आणि त्यावर वाढते.


प्रसन्नने प्रोजेक्टसाठी डकवीड संबंधित विषय निवडला.डकवीडच्या काही जाती त्यांचे बनवलेले अन्न स्टार्चच्या स्वरूपात तर काही जाती प्रोटिन्सच्या रूपात जमा करून ठेवतात. प्रसन्नला त्याच्या प्रोजेक्ट व या विषयातली ताकद हळूहळू लक्षात येवू लागली.जगात यावर काम सुरू आहेच.भारतातील सांडपाण्याची व त्यातून आरोग्याची समस्या खूप मोठी आहे त्या दृष्टीने डकवीडच्या मदतीने सांडपाणी शुद्धीकरणाला खूप वाव मिळू शकेल,हे त्यांनी हेरले.हे उत्तम पशुखाद्य असल्याने प्रदूषण निर्मूलनाबरोबरच उच्च प्रतीचे पशुखाद्य निर्मिती हा दुहेरी फायदा साधता येईल असे त्याला वाटले.त्याने एम.एस. बायोटेक विषयात करतानाच ही दिशा ही निश्चित केली. 


एम.एस.करून भारतात परतल्यावर काही दिवस फर्गसन कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून रुजू झाला.काम शिकवण्याचे होते,पण त्याचे जास्त लक्ष संशोधनावर होते.पुजा तेंडूलकर या विद्यार्थिनी बरोबर संशोधनासाठी प्राथमिक काम सुरू केले.विषय निवडला 'मुठा नदीच्या पाण्याच्या शुद्धीकरणासाठी पर्यायाची चाचपणी करणे.' तीन ठिकाणचे पाण्याचे नमुने गोळा केले,खडकवासला धरणाजवळ नदी सुरू होते तिथे; दुसरा नमुना ओंकारेश्वरजवळ;तिसरा नमुना संगम पुलाजवळ घेतला. खडकवासल्याजवळ म्हणजे जास्तीत जास्त मूळ स्वरूप नदीचे,ओंकारेश्वरजवळ म्हणजे जिथे जास्तीत जास्त शहराचे मैलापाणी नदीत येते आणि संगम पुलाजवळ इंडस्ट्रियल सांडपाण्याचा प्रवाह येऊन मिळतो.काम सुरु केले होते.कुणाला काही मदत मागायला गेले, परवानगी मागायला गेले किंवा माहिती सांगायला गेले की लोक प्रसन्नला पदवी, डॉक्टरेट,स्पेशलायझेशन याबद्दल विचारू लागले.प्रसन्नला प्रोत्साहनापेक्षा निराशजनक प्रतिसाद येऊ लागला.विषय जाईचना. 

मग एका क्षणाला प्रसन्नने निर्णय केला की आपण डॉक्टरेट पूर्ण करून टाकू...!


गुणवत्तेच्या बाबतीत जगात अकरावा नंबर असलेल्या सिंगापूरच्या नानयांग टेक्नोलॉजिकल युनिव्हर्सिटी (NTU) या विद्यापीठात त्याने अर्ज केला.तिथल्या संशोधनासाठीच्या पायाभूत सुविधा व मार्गदर्शक दोन्हींच्या दर्जाने प्रसन्नला तिथेच जाणे इष्ट वाटले.त्याला डकवीडवरच संशोधन करुन डॉक्टरेट करायची होती.तशाच तयारीने तो गेला होता.पण जसजसा विषय पुढे सरकला, प्रयोग करण्यासाठी जागा वगैरेच्या परवानगी मागायला सुरू झाले त्या वेळी परत माघार घ्यावी लागली.कारण सिंगापूरला सर्वात मोठी टंचाई जागेची आहे आणि या प्रयोगाला तर काही ना काही जागा लागणारच होती.परत तलवार म्यान करावी लागली,ध्यास मात्र तसाच राहिला.


जागा नाही,प्रयोग नाही,तर निधी मिळणार नाही. सगळाच हिरमोड झाला.मग त्या विद्यापीठात Role of Microorganisms in marine corrosion' या विषयात डॉक्टरेट पूर्ण केली. प्रबंध पूर्ण होत गेला तसतशी भारतातील पुढील योजनेची तयारी सुरू केली.जुन्या समविचारी मित्रांना संपर्क करून काम सुरू करूया अशी चर्चा सुरू केली.काहींनी प्रतिसाद दिला आणि मग भारतात आल्यावर प्रसन्नने एका कंपनीची स्थापना केली.त्यात त्याची फर्ग्युसन कॉलेजची विद्यार्थिनी पूजा तेंडुलकर आणि इतर काही मित्र हे सहभागी आहेत.दरम्यान पूजा तेंडूलकरनेही सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प काही ठिकाणी यशस्वी केले होते.


कंपनीमार्फत २०१८ ला काम सुरू केले. 'लेमनिऑन ग्रीन सोल्युशन्स' असे कंपनीचे नाव. हे नाव भारतात जास्त प्रमाणात आढळणाऱ्या डकवीडच्या एका प्रजातीच्या नावावरून घेतले आहे.


डकविक हिरवे हिरवे खवले पाण्यावर तरंगत आहेत असं दिसतं ते किंवा दगडफूल हिरवं असतं तर कसं दिसलं असतं तसं ते दिसतं. पाण्यावर आडवी पसरत त्याची वाढ होते.मूळ खाली पाण्यात तीन ते चार इंचापर्यंत वाढतात. वनस्पतीशास्त्राच्या भाषेत ती 'अंजीओस्पर्म' या प्रकारातली.म्हणजे नेचे वगैरे प्रकारातली.अ अपुष्प वनस्पती आणि याचे पुनरुत्पादन विजिटेटीव्ह रिप्रोडक्शन प्रकारातून होते. भारताच्या पाच सहा प्रकारच्या जाती सापडतात पण विपुल प्रमाणात दिसणारी जात म्हणजे 'लेम्नि शिया' जगात आतापर्यंत ३६ प्रकारच्या डकवीडच्या जाती नोंदवल्या गेल्या आहेत.याचा वाढीचा वेग खूप जास्त असतो.आता बायोमास भाषेत सांगायचे झाले तर ५० ग्राम बायोमासचे दोन-तीन दिवसात शंभर ग्राम इतके बायोमास तयार होऊ शकते.या एकूण वजनात ३० ते ४० टक्के प्रोटीन असतात.ही प्रोटीन्स जनावरे व माणसे खाऊ शकतील अशा रासायनिक रचनांची असतात.मुख्य म्हणजे या डकवीडच्या मुळावर व पानांवर जे विशिष्ट बकरी असतात ते सांडपाण्यातील विविध विद्राव्य व अविद्राय घटकांचे विघटन करतात.ते विघटीत घटक डकवीड मुळावाटे शोषून घेते व आपल्या अन्नात व बायोमासमध्ये रुपांतर करते.त्यामुळे पाण्यातील विद्राव्य व अविद्राव्य घटक कमी कमी होत जातात.पाण्यातील हे घटक कमी झाल्याने हळूहळू ऑक्सिजन विरघळत जाऊन पाणी अधिक जिवंत होऊ लागते म्हणजे पाण्यात जीवसृष्टी वाढू शकेल अशी स्थिती निर्माण होते.


हे तंत्रज्ञान नवीन,विषय नवीन,कुठून कशी सुरुवात करायची? की एखादे काम हातात घ्यायचे?की व्यावसायिक पातळीवर पैसे गुंतविण्यासाठी कसे पुढे आणायचे? सगळेच प्रश्न होते.


याची उत्तरे प्रत्यक्ष पुस्तकात भेटतील.


जाता जाता...!


मेनका प्रकाशन यांनी खूपच आकर्षण पद्धतीने मांडणी करून जास्तीत जास्त पुस्तक आकर्षित बनवलेलं आहे. यांचे मनःपूर्वक आभार..!


'अभिनव जलनायक' हे पुस्तक मानवी जीवनातील 'जीवन' पाणी यासाठी नम्रपणे वाहिलेले आहे. जलसंवर्धनाचे आधुनिक तंत्रज्ञान आणि ते साकारणाऱ्या तंत्रज्ञानाच्या सरळ साध्या सोप्या गोष्टी सोप्या समजतील अशा भाषेत आहेत.


या पुस्तकाचे लेखक 'सतीश खाडे' हे माझे मनस्वी मित्र आहेत.युवराज माने यांच्यामुळे या अद्भुत व्यक्तिमत्त्वाशी माझी ओळख झाली.


तहानलेल्या माणसाला पाण्याची तहान लागते आणि पाणी पिल्यानंतर त्याला जसं आत्मिक समाधान मिळतं. तसंच कधीकधी 'पाण्यालाही' तहानलेल्या माणसाची तहान लागते व ते पाणी कोणत्या ना कोणत्या स्वरूपात त्या तहानलेल्या माणसाजवळ जाते. तसंच या पुस्तकाबद्दल म्हणावे लागेल.


स्वतःसाठी एक झोपडी बांध आणि जिवंत असतानाच स्वतःची चिरफाड करण्याची प्रक्रिया सुरू कर...!


एमर्सन हेन्री डेव्हिड थोरोला म्हणाला होता.


ह्या पुस्तकाचे परीक्षण व समिक्षा मी केलेली नाही,तर ह्या पुस्तकानेच माझे परीक्षण व समिक्षा केलेली आहे.( माझी जिवंत असतानाची चिरफाड केलेली आहे. )


अशी पुस्तके सोबत असणं म्हणजे अज्ञात आयुष्य ज्ञात करून परिपूर्णतेने प्रवास करण्यासारखं आहे.पुस्तकातील दोन ओळींमधील मोकळ्या जागेतील मी प्रवासी आहे.आणि या पुस्तकासोबत घेऊन केलेला प्रवास माझ्यासाठी अविस्मरणीय व अलौकिक असा आहे.


पाणी सर्वांसाठी तर या पाण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र यावं व एकत्रितपणे एकसारखे जीवन जगावं असा संदेश हे पुस्तक देते.


मेनन पिस्टन रिंग्ज या ठिकाणी मी फॉड्री मध्ये मी काम करतो.जास्त तापमानामध्ये काम करत असूनही माझं हे आयुष्य पाण्यासारखं शांत व शितल आहे.हे या पुस्तकाच्या संगतीचे परिणाम आहेत.


या पुस्तकाचं वाचन चालू असताना.एक महत्वाची घटना घडली ज्या घटनेने माझ्या आयुष्यामध्ये महत्त्वाचा बदल केला.


'सहित वितरणचे' शिंदे साहेब ज्यांना मी पुस्तकातील महान माणूस म्हणतो.त्यांना सहज मी बोलत असताना,या महिन्यांमध्ये पैशाचं गणित जमणार नाही.( ते मला कधीच जमत नाही) या महिन्यात मला पैसे अभावी पुस्तक घेता येणार नाहीत.नंतर घेतो'त्या वेळेला त्यांनी दिलेलं उत्तर माझ्यासाठी खूपच प्रेरणादायी होतं."पैशाचं नंतर बघू ते राहू दे ! मी पुस्तक पाठवतो.'काहीही झालं तरी तुमचं वाचन थांबवू नका.'मी तुमची पुढील पुस्तके मी पाठवून देतो. अशी महान माणसं मला अशा महान पुस्तकांमुळेच भेटलीत.


'अभिनव जलनायक' हे पुस्तक लिहून सतीश खाडे यांनी


' ज्या झाडाच्या सावलीत बसण्याचा त्यांनी कधी विचारही केला नव्हता,असे झाड त्यांनी आपल्या सर्वांसाठी लावलेले आहे.'


आपण करून दिलेली ही नवीन ओळख माझ्यासाठी माझं जनुक बदलणारी आहे.मी आपल्या लिखाणाचा मनापासून आभारी आहे. हे नवीन जीवन,नवीन दृष्टिकोन माझ्या उर्वरित आयुष्यासाठी एक संजीवनी ठरणार आहे. हे पुस्तक वाचल्यानंतर खऱ्या अर्थाने माझा जन्म झाला आहे.मी स्वतंत्र झालो आहे.

आपल्या सर्वांचे पुनश्च मनःपूर्वक आभार व धन्यवाद..!


◆विजय कृष्णात गायकवाड