* विजय गायकवाड | Vijay Gaikawad: तरुण मुलीची सत्यकथा / True story of a young girl

live

नमस्कार आपले स्वागत आहे. मी पुस्तके आणि मित्रांवर पैसे खर्च करतो,माझ्याकडे दगड आणि विटांवर खर्च करण्यासाठी पैसे नाहीत.- रस्किन बाँड.ही थोर माणसं व त्यांचे विचार मला पुस्तकात भेटलीत.ती भेटली आणि त्यांनी सांगितले कि, प्रत्येक दिवशी असं काही तरी करा की,ते तुम्हाला अधिक सुंदर उद्याच्या दिशेने खूप लांबवर घेऊन जाईल."- डोग फायरबाऊ.' सर्वियन कादंबरीकार मिलोराद पावीच यांचे एक वाक्य आहे ते म्हणतात - जोवर जगात पुस्तक वाचणाऱ्या वाचकांची संख्या बंदूकधारी सैनिका पेक्षा अधिक आहे तोवर काळजीच काहीच कारण नाही.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात.पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये.म्हणून अविरतपणे प्रयत्न करणारे मार्गदर्शक, मित्र धावून येतात.प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,डॉ.दीपक शेटे,आ.भरत बुटाले,प्रा.सर्जेराव राऊत,सुभाष ढगे,अनिल फारणे,डॉ.सुधीर सरवदे ,विश्वास खाडे, विनायक पाटील,संजय कुंभार,सतीश खाडे,मनोहर सुर्वे,गणेश खंदारे,तात्या गाडेकर, दादासाहेब गाडेकर, दादासाहेब ताजणे, पुस्तकातील घटना प्रसंग सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील यांनी केलेले आहे. मला लिहिण्याची प्रेरणा देणारी पुस्तके,लेखक,प्रकाशक,मित्र ही जगावेगळी माणसं माझ्या जीवनातील महत्वाचा टप्पा आहेत.... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ.मेघा गायकवाड, चिरंजीव मयान,माझ्या धावण्यातील गुरुवर्य नामदेव बरुरे,लुल्ला शेख मोठी ताई ,लहान ताई जयश्री शिंदे या सर्वांचेच मनापासून आभार व धन्यवाद मॅट्रिक फेल विजय गायकवाड

5/7/26

तरुण मुलीची सत्यकथा / True story of a young girl

त्या रात्री ज्युलियनला गाढ झोप लागते. रात्रीतून किती किडे अंगावर वळवळले असतील, कोणते प्राणी आसपास फिरून गेले असतील याचा विचार करण्याचंही ती टाळते. बहुतेक अजूनही तिच्यावरच्या धक्क्याचा परिणाम पुरता ओसरलेला नसतो. सकाळी उठून ती पुन्हा चालू लागते. चालताना अनेकदा तिला धोकादायक किडे दिसत असतात. एके ठिकाणी पक्ष्याला गिळंकृत करू शकणारा एक मोठा विषारी कोळी तिला दिसतो. धोका वाटला तर माणसावरही हल्ला करणारा तो कोळी असतो. पण नशिबाने तो झऱ्याच्या दुसऱ्या बाजूला असतो. ज्युलियन आणि तो दोघंही एकमेकांकडे बघतात आणि आपापल्या दिशेने चालू लागतात.खूपदा ज्युलियनला आकाशातून विमानांचे आवाजही ऐकू येत असतात.

बचावकार्यासाठी घिरट्या घालणारं विमान असावं असं ती ताडते; पण झाडांच्या दाटीतून तिला विमान दिसणं शक्य नसतं, मग विमानातून ती दिसणं तर लांबच राहिलं. पण तरीही विमानाचा आवाज ऐकू आल्यावर ती खच्चून ओरडून घेते.

आपला आवाज या झाडांच्या टोकांपर्यंत पोहोचणंही शक्य नाही हे माहिती असूनही. कदाचित जसजसा हा झरा मोठा होत जाईल आणि त्याचं रूपांतर नदीत होईल तिथे कदाचित जंगलही कमी झालेलं असेल आणि विमानातून खालचा भाग दिसू शकेल. तोपर्यंत आपल्याला चालत राहण्याशिवाय पर्याय नाही, अशी खूणगाठ बांधून ज्युलियन चालत राहते.

पायपिटीचे पहिले दोन-तीन दिवस ज्युलियन जास्त विचार न करता यांत्रिकपणे चालत असते. अजूनही तिची बधिरावस्था पूर्ण संपलेली नसते. अधूनमधून तिच्या मनात आईचा विचार डोकावत असतो; पण आतापर्यंत नक्कीच आईची सुटका झाली असेल असं मानून ती सारे विचार मनातून बाजूला काढून टाकते. झऱ्याकाठाने चालत राहणं एवढंच आपलं सध्याचं काम आहे असं जणू या परिस्थितीने तिला सांगितलेलं असतं.

चौथा दिवस थोडा वेगळा उजाडतो. दुपारच्या वेळेस तिला एक कर्कश आवाज ऐकू येतो. तो ऐकून पहिल्यांदाच ज्युलियन भीतीने गोठून जाते. आवाजावरूनच ती ओळखते की हा भल्या मोठ्या गिधाडांचा आवाज आहे. एवढ्या जवळ गिधाडं आहेत याचा अर्थ कुठे तरी मोठ्या प्रमाणावर मांस आहे हे उघड असतं. तिच्या मनात येतं, या गिधाडांचं इथे येण्याचं कारण माझी आईच असेल तर ? थोड्याच वेळात तिला गिधाडांचं अन्न दिसू लागतं. विमानातल्या तीन आसनी खुर्चीवर तीन मृतदेह वेड्यावाकड्या अवस्थेत पडलेले असतात. जमिनीत घुसलेली तोंडं आणि आकाशाच्या दिशेने उंचावलेले पाय. त्या तिघांमधली एक बाई असते. ती आपली

आई तर नसेल ना, या विचाराने ज्युलियन सुन्न होऊन जाते. त्या ठिकाणाहून पळून जावं अशी इच्छा तिचा ताबा घेते, पण शहानिशा करण्याशिवाय पर्याय नसतो. जवळ जाऊन बघते तर तिला त्या बाईच्या पायाची रंगवलेली नखं दिसतात. ती सुटकेचा निःश्वास टाकते. आई कधीच नखं रंगवत नाही, हे तिला माहीत असतं. पण त्या दृश्यामुळे तिची बधिरावस्था थोडीशी कमी होते. आपल्या आईचं काय झालं असेल, हा विचार तिच्या मनाचा ताबा घेतो. आई सुखरूप असणार, असं स्वतःला बजावत ती चालत राहते.आता ज्युलियनकडच्या कँडीही संपलेल्या असतात. पावसाळा असल्यामुळे कुठल्याच झाडाला फळं नसतात.पामचा गर वगैरे खावा म्हटलं तर तो काढण्यासाठी तिच्याकडे सुरी नसते. जंगलातल्या बहुतेक गोष्टी विषारी असल्यामुळे कुठलाही धोका पत्करायला ती तयार नसते. त्यामुळे झऱ्यातलं माती मिसळलेलं गढूळ पाणी पिऊन पोट भरण्याशिवाय आता दुसरा पर्याय नसतो,पण जिथे मानवी वस्ती नाही तिथलं पाणी पिण्यात फारसा धोका नाही एवढं ज्युलियनला माहिती असते. बहुधा ते पाणी प्यायल्यामुळेच तिला भुकेचीही फारशी जाणीव होत नाही ही त्यातल्या त्यात चांगली गोष्ट.पण तिच्या शरीरातली ताकद मात्र झपाट्याने कमी व्हायला लागलेली असते.

पाचव्या किंवा सहाव्या दिवशी तिला एका ओळखीच्या पक्ष्याचा आवाज येतो.पाण्याच्या मोठ्या साठ्याजवळ आढळणाऱ्या या पक्ष्याचा तिच्या आईने सखोल अभ्यास केलेला असतो.

पाण्याजवळ आढळत असल्याने त्याच्या आसपास मानवी वस्तीही असू शकते,असं वाटून आपला एरवीचा बेफिकीर मूड बाजूला ठेवून ज्युलियन काहीशी आनंदित होते. अतिशय अवघड वाट चालत चालत अखेर ती अशा ठिकाणी येऊन पोहोचते की तिच्या झऱ्याने आता छोट्या नदीचं रूप घेतलेलं असतं.साधारण तीसेक फूट रुंद पात्र तिच्या समोर असतं.वर पाहते तर जंगलही काहीसं विरळ झालेलं असतं आणि आकाशाचा एक तुकडा तिला स्वच्छ दिसू लागतो.आता इथून वस्ती फार दूर नसणार असं तिला वाटून जातं.थोड्याच वेळाने तिला विमानांची घरघरही ऐकू येऊ लागते.

ती पुन्हा एकदा जोरजोरात ओरडून विमानांचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करते.आता आपण विमानातून नक्की दिसू असं तिला वाटत असतं.विमानांचे आवाज कमी कमी होत लांब निघून जातात तेव्हाही ती स्वतःची समजूत काढते, की आता थोड्याच वेळात विमान पुन्हा परतेल आणि आपली सुटका होईल.पण बराच काळ जाऊनही काहीच घडत नाही.अंधार पडू लागतो तसं तिचं मन निराशेने भरून येतं.आपण सोडून विमानातल्या इतर सगळ्या प्रवाशांची सुटका झाली असणार आणि आपण सापडत नसल्यामुळे आता शोधमोहीम थांबवण्यात आली असणार असं वाटून तिचा संताप संताप होतो.रागाचा भर ओसरल्यावर ज्युलियन थोडी शांत होते.

आपल्याकडे एवढ्या भावनिक आंदोलनांसाठी अजूनही इतकी शक्ती शिल्लक आहे याचं तिला आश्चर्य वाटत राहतं.याचा अर्थ अजूनही आपण आशा सोडता कामा नये. चालत राहिलो तर लवकरच एखाद्या वस्तीपाशी पोहोचू, हा विचार पुन्हा एकदा तिचा ताबा घेतो आणि पुन्हा एकदा पुढे मार्गक्रमण कसं करायचं याचा विचार करण्यात ती स्वतःचं मन गुंतवते.एकच सँडल घातलेल्या पायांनी काठावरून चालवणं अवघड जात असल्यामुळे ती नदीच्या पात्रातूनच चालायचं ठरवते.शिवाय जंगलामध्ये नदीच्या काठावर स्टिंग रे विश्रांती घेत बसलेले असतात याचीही तिला माहिती असते.अशा एखाद्या स्टिंग रेवर चुकून जरी पाय पडला तरी मृत्यू ओढवणार हे नक्की.त्यापेक्षा नदीतून चाललेलं बरं, असा विचार ती करते.अर्थात नदीच्या पाण्यातही धोके कमी नसतात.मगरींची भीती असते.शिवाय पिरान्हा नावाचे शिकारी मासेही या पाण्यात आढळण्याची शक्यता असतेच.पण हे प्राणी कारणाशिवाय माणसावर हल्ला करणार नाहीत हे ज्युलियनला माहिती असतं. शिवाय,

काहीही असलं तरी हे धोके पत्करून चालत राहण्याशिवाय तिच्यापुढे पर्याय काय असतो?एखादी चांगली जागा सापडली तर तिथेच थांबून राहावं आणि सुटकेसाठी कोणी येईल याची वाट पाहावी का,असंही तिच्या मनात एक-दोनदा येऊन जातं.पण आता थांबलो आणि आणखी चार दिवसांनी पुन्हा चालण्याची वेळ आली तर तेवढी शक्ती आपल्याकडे उरणार नाही आणि आपण या जंगलातच संपून जाऊ याची जाणीव तिला पुढे रेटत असते.चालत राहिलो तर आपण एक ना एक दिवस मानवी वस्तीपर्यंत किंवा सुटकेसाठी शोधमोहीम राबवणाऱ्यांपर्यंत पोहोचू,असा विश्वास तिला मनातून वाटत असतो.एक चांगलं असतं,की मनातून तशी शंका असली तरी आता लवकरच शोधमोहीम थांबवली जाणार असल्याचं ज्युलियनला कळण्याची काही शक्यता नसते.तिला हेदेखील कळण्याची शक्यता नसते की विमानातील एकाही व्यक्तीची सुटका झालेली नसते.किंवा,तेव्हा तिला याचीही कल्पना आलेली नसते की विमान पडल्यानंतर सर्वच प्रवाशांना लगेच मृत्यू आलेला नसतो.काही प्रवासी काही काळ जिवंत असतात;पण तिथून बाहेर पडून स्वतःची सुटका करून घेण्याचं ज्युलियनसारखं भाग्य त्यांना लाभत नाही.त्या प्रवाशांमध्ये तिच्या आईचाही समावेश असतो.पुढे तिला जेव्हा हे समजतं तेव्हा आईचं त्या काळात काय झालं

असेल या विचाराने ती किती तरी रात्री तळमळत काढते.जंगलात असताना झाला नसेल एवढा त्रास तिला पुन्हा बाहेरच्या जगात येऊन या सत्याशी सामना करताना होतो.एका अर्थाने तिचा जगण्याचा झगडा सुरू होतो तो तिथून बाहेर पडल्यावरच.

पण सध्या आत जंगलात मात्र सर्व बातम्यांपासून दूर ती स्वतःच्या विचारांमध्ये चालत असते;पण पहिल्या तीन-चार दिवसांनंतर मात्र चालणं आणि रात्रीची झोप या दोन्ही गोष्टी अधिकाधिक त्रासदायक बनत जातात. रात्र तर अतिशय वेदनादायी असते.डास किंवा कोणते ना कोणते किडे रात्री तिच्या जवळपास उघड्या अंगावर चाल करून येत असतात.थोडी डुलकी लागते ना लागते तोच नवा दंश तिला जागं करत असतो.

चिलटं,माश्या, पिसवा आणि अशा हजारो प्रकारच्या किड्यांची संख्या इतकी असते की बास.ते किडे तिच्या तोंडात,नाकात, डोळ्यांत,कानांत सगळीकडे शिरून चावे घेत असतात. हे कमी की काय,म्हणून कधी तरी रात्रीतूनच पाऊस सुरू होतो.दिवसाच्या वेळी जंगलातली हवा दमट आणि उष्ण असली तरी रात्री पाऊस सुरू झाल्यावर मात्र कडाक्याची थंडी वाजते.पावसाचे थेंब सुया टोचल्यासारखे ज्युलियनच्या अंगात घुसत असतात. छोट्याशा ड्रेसमध्ये चिंब भिजून आता आणखी थंडी सहन होणं शक्य नाही अशा परिस्थितीत ज्युलियन रात्रच्या रात्र कुडकुडत काढते.

अशा वेळी बहुतेकदा ज्युलियन आपल्या आईचा विचार करत प्रार्थना करत राहते.हा अपघात कसा काय झाला, आपण उठलो तेव्हा एकट्याच कशा काय होतो,बाकीचे प्रवासी कुठे गेले,आई कुठे असेल,विमानाचे अवशेष कुठे पडले असतील,असे कोड्यात टाकणारे प्रश्न तिच्या मनाला व्यापून असतात.एवढ्या उंचीवरून पडल्यावरही आपण कसे काय वाचलो,हा प्रश्न तर अनेकदा तिच्या मनात उचंबळून येत असतो.

ज्याअर्थी आपण १० हजार फुटांवरून कोसळूनही वाचलो त्याअर्थी आता आपण या जंगलात मरून जाणं शक्य नाही. आपण जिवंत राहिलो त्यामागे काही तरी कारण असणार,

असं तिला सतत वाटू लागतं.चालता चालता,रात्र मुक्कामाच्या ठिकाणी थांबल्यावर ती खूप वेळ हा विचार करत राहते.आपण का जिवंत राहिलो?आपल्या आयुष्याचा हेतू काय? त्यातून आजवर कधीच न पडलेले प्रश्न तिला पडू लागतात.आपल्या आई-वडिलांप्रमाणे आपणही जीवशास्त्राचा अभ्यास करायचा हे आधीपासूनच ठरलेलं असतं,पण त्यामागच्या कारणांचा फारसा विचार मात्र तिने केलेला नसतो.पण आता स्वतःचा संवाद करायला वेळच वेळ असण्याच्या काळात हा विचार तिचं मन व्यापून टाकतो.ज्या जंगलातून ती बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असते त्याच जंगलाच्या अभ्यासासाठी,तिथल्या पक्ष्या-प्राण्यांच्या अभ्यासासाठी आपण आयुष्यभर काम करायला हवं…!

अपूर्ण शेवटचा तिसरा भाग पुढील लेखामध्ये…!!