ऑगस्टच्या शेवटी एका निरभ्र दुपारी महासमाज एका महत्त्वाच्या वार्षिक समारंभाची तयारी करत होता.सगळं वर्ष संभोग उड्डाणाकडे जात असतं. वारुळानं नवे जन्म देण्याची घटना असते ती. वारुळाचं सातत्य संभोग-उड्डाणानं राखलं जातं. मुंगी-प्रजातीचं अमरत्व त्या उड्डाणानं टिकवलं जातं. वेळकाळ योग्य होता.दोन दिवस आधी एका ढगांच्या समूहानं नोकोबी परिसरावर पाच सेंटिमीटर पाऊस ओतून जमिनीला ओलावा दिला होता. उन्हाळ्यानं कोमेजलेली झाडं नव्यानं तरारून उठत होती.सूर्य आणि नुकताच झालेला पाऊस यामुळे हवा शांत,दमट झाली होती.
मुंग्यांच्या मेंदूंमधल्या पंचांगानं संभोग उड्डाणाचा मुहूर्त जवळ आल्याची सूचना दिली.हजारो कामकरी मुंग्या जमिनीखालून पृष्ठभागावर येऊन धावाधाव करत होत्या.लवकरच शेकडो राजकुमारी आणि नरही जमिनीखालून वर आले.कोणीच उड्डाण करत नव्हतं.कोणीच वर भरारी मारत नव्हतं. महासमाजात उड्डाणाचा भाग बाद होऊन संभोगाचाच भाग उरला होता.अनेक नर एकमेकांना ढकलत,दूर सारत राजकुमारींशी जुगायला झटत होते.एखाद्या नरानं राजकुमारीशी संभोग करून शुक्राणू तिच्यात ओतले,तरी आसपासची धक्काबुक्की कमी होत नव्हती. संभोग न जमलेले नर धावपळ करून न फळलेल्या राजकुमारींच्या शोधात होते.त्यांचं आयुष्य लहानखुरं होतं.आणि राजकुमारीला गाठता न आलेल्या नरांचा निर्वंश होणार होता. कडोनिकडीची लढाई होती ही.
संभोग-स्पर्धेत जिंकलेले आणि हरलेले,सगळेच नर जरासे उडून मेले.नोकोबी परिसरातल्या सर्व दिव्यांखाली रात्री मेलेल्या मुंग्यांचा खच पडला.किडे,सरडे,विंचू,कोळी,
बेडूक,सगळे या मेजवानीवर ताव मारत होते. माणसांना मात्र जिवंत आणि मेलेल्या मुंग्यांचा त्रासच होता.सगळी अंगणं,बागा, रस्ते झाडावे लागले !
नरांच्या धडपडीच्या विरुद्ध स्थिती राजकुमारींची होती.एक संभोग,कधी एकापेक्षा जास्त संभोग, की पुन्हा जमिनीत जायची तयारी.पंख मोडायचे आणि आत एखादं दालन शोधून महासमाजासाठी अंडी द्यायला लागायचं.आज मात्र हे झालं नाही.हलत्या झाडांनीही आज मुंग्यांवर 'दैवी प्रकोप' पाठवायचं ठरवलं होतं. अनेक हलणारे झाड-देव घुबड तलावाकाठी आले. त्यांच्या सावल्यांनी,त्यांच्या वासांनी सगळा महासमाज परिसर व्यापला.त्यांच्या फांद्यामध्ये मोठाल्या वस्तू होत्या.त्या वजनांमुळे झाडं चालताना जमीन हादरत होती.आणि वातावरण एक विचित्र आवाजानं भारलं, तो आवाज ढगांच्या गडगडाटासारखा नव्हता,उंच झाडांमधून वाहणाऱ्या वाऱ्यासारखा आवाज होता तो.
तासाभरानं जमिनीवरच्या मुंग्यांना जाणवलं की झाड-देव परत येताहेत.पण या वेळी काहीच दिसत नव्हतं.फक्त एक विचित्र दुर्गंध हवेत होता.मुंग्या एकमेकींना धोक्यापासून सावध राहायला जसे फेरोमोन संदेश देतात,तसला हा वास. जमिनीवरच्या मुंग्या बावरून सैरावैरा पळायला लागल्या.शत्रू शोधत होत्या त्या. पण शत्रूचा पत्ता नव्हता.आणि मग मिनीटभरात सगळ्या क्षेत्रांवर एक रासायनिक ढग पसरला.
काही मुंग्यांनी हा तपासायला शिंगं उभारली,आणि त्या तत्काळ कोलमडल्या.त्या वात झाल्यासारख्या लोळागोळा होऊन पडल्या आणि मरण पावल्या.
रासायनिक ढग खाली जमिनीवर येऊन स्थिरावला,आणि जमिनीवर एकही मुंगी जिवंत उरली नाही.ढगामागून झाड-देव आले,आणि त्यांच्या फांद्यांमधल्या वस्तूंमधून काहीतरी द्रव पदार्थ जमिनीवर फवारला गेला.वारूळ-जंजाळाच्या प्रत्येक दारातून झाड-देवांनी ते द्रव्य सोडलं.
दुसऱ्या सकाळी महासमाज,महानगर,साम्राज्य सगळं संपलं होतं.ते झालं होतं मुंग्यांचं मृत्यु-क्षेत्र. सगळा परिसर निर्जीव झाला होता.मुंग्याच नव्हेत, तर सर्वच लहान जीव झाड-देवांनी मारून टाकले होते.पक्षी,
सरडे,खारी,काहीही जिवंत नव्हतं. महासमाज क्षेत्राबाहेर हे सगळे जीव शाबूत होते, आणि मुंग्याही.पण ते कोणीही या जहरी क्षेत्राजवळही येत नव्हते.झाड-देवांनी न तुडवलेली झुडपं आणि झाडोरा शिल्लक होता.कीटकसृष्टीचा मात्र आता मागमूसही उरला नव्हता.वाऱ्यानं होणारी झाडांची सळसळ,तलावाकाठचा लाटांचा नाद,हे सोडून नीरव शांतता पसरली होती.
नवा गडी...
दोन लहानशा झाडांच्या मुळांमध्ये जमिनीत एक खड्डा होता.त्यात एक लहानसं,झुडपांमध्ये घडवलेलं वारूळ होतं;झुडूप-वारूळ म्हणू या त्याला महासमाजाच्या मृत्युक्षेत्राच्या जरा कडेला हे वारूळ होतं.
आधी जेव्हा पायवाट वारूळ आणि नंतर ओढा वारूळ या भागावर सत्ता गाजवत असत, तेव्हा त्यांच्या गस्ती मुंग्या कधीकधी झुडूप-वारुळाच्या दाराजवळूनही जात असत.पण त्यांना हे लहानखुरं वारूळ जाणवत नसे.झुडूप वारुळातल्या मुंग्या आपल्या वारुळाजवळच वावरत.अन्न कमी असल्यानं वारुळाची वाढ मंद होती.थोडेसे मेलेले कीटक,इतरांना न सापडलेले, यांच्यावरच जेमतेम गुजराण होत असे.महासमाज घडल्यावर तर स्थिती आणिकच बिघडली.त्यांच्या मुंग्यांची गस्त जास्त आक्रमक असायची.त्या मुंग्या झुडूप-क्षेत्रात जास्त घुसखोरीही करायच्या,आणि सहजच मारामारीला तयार व्हायच्या.. झुडूप- वारुळाचं क्षेत्र यामुळे आणिकच आक्रसलं.महासमाज माणसांच्या विषप्रयोगानं मेला,त्याच वेळी झुडूप-वारूळही खचत आलं होतं.पायवाट वारुळाच्या काळात झुडूप-वारुळात शंभरेक मुंग्याच होत्या.महासमाज काळात तर जेमतेम वीस मुंग्या उरल्या,आणि त्याही बाहेर पडायला घाबरणाऱ्या. या वीस मुंग्यांमध्ये एकही सैनिक नव्हती.राणीची अंडाशयं सुकून चालली होती.अन्न कमी मिळाल्यानं अंडी देणं थांबलं होतं.कामकरी मुंग्या मरण्याचा वेग मात्र वाढला होता.उन्हाळा संपेपर्यंत झुडूप-वारूळ मरणार,आणि महासमाजाच्या जंजाळाचा भाग बनणार,असं चित्र दिसत होतं.पण हलते झाड-देव आले,आणि त्यांनी महासमाजाला ठार मारलं.त्या चमत्कारानं झुडूप वारुळावरचा जीवघेणा दबाव एकाएकी संपून गेला.
काही महासमाजी गस्ती मुंग्या जवळपास होत्या, पण घराकडे परतायचा प्रयत्न करताच त्याही विषारी जमिनीवर मरून पडल्या.आठवड्याभरात त्यांच्या वास्तव्याच्या फेरोमोन-खुणाही संपून गेल्या.आता घाबरत,बिचकत झुडूप-मुंग्या बाहेर पडू लागल्या.पूर्वी प्रबळ शेजारी असल्यानं अन्न मिळवणं अवघड जायचं.आता मात्र स्पर्धा संपल्यानं अन्न वाढलं.मेलेले कीटक,सहज पकडता येणारे कीटक,मावा किड्यांची विष्ठा,सगळंच आता जास्त प्रमाणात मिळू लागलं.पंधरा-तीन वारांमध्ये राणीची अंडाशयं पुन्हा जोमदार झाली.अंडी,निरोगी अळ्या वगैरेंनी संगोपन दालनं गजबजली.स्थिरावलेली लोकसंख्या नव्यानं वाढायला लागली.हिवाळा संपून वसंत ऋतू आला,तोपर्यंत झुडूप-वारूळ जोमदार झालं.कामकरी मुंग्या दूरवर फिरून नवनवे अन्नाचे स्रोत शोधून काढू लागल्या. आता महासमाजाच्या मृत्युक्षेत्रातलं विषही उडून, धुऊन गेलं होतं,आणि त्या भल्याथोरल्या क्षेत्रात कीटक आणि अळ्या सुरवंट पुन्हा वावरायला लागले होते.त्यांच्यावर जगणं झुडूप-मुंग्यांना सोपं जात होतं.नुकतंच वैराण असलेलं क्षेत्र आता नव्यानं पेरलेल्या,वाढलेल्या बागेसारखं झालं होतं. महासमाजाच्या वारूळ-जंजाळानं जमीन भुसभुशीत झाली होती.
महासमाजी मुंग्यांची प्रेतं कुजून जमिनीला खत मिळालं होतं.हे खत आणि आतवर खेळणाऱ्या हवेनं वनस्पतींची वाढ जोमदार झाली होती.गवत,झुडपं यांच्या बिया शेजारच्या जंगलातून येऊन पडल्या,की झपाट्यानं मुळं धरून त्यांची वाढ होत होती.जुन्या मृत्युक्षेत्रावर आता वनस्पतींचा हिरवाकंच गालिचा पसरला होता.
वसंत ऋतूत या वनस्पतींची फुलं फुलली,आणि त्या सुगंधानं परागीकरण करणारे जीव मृत्युक्षेत्रात परतले.भुंगे,पाकोळ्या,फुलपाखरं यांनी सगळं क्षेत्र जिवंत झालं.आणि मुंग्यांचं अन्नही भरपूर आणि विविध प्रकारचं झालं.नुकतीच या भागावर महामारी येऊन गेली,याच्या खुणाही पूर्णपणे पुसल्या गेल्या.
वारुळ पुराण,सातेरीचा वाडा झाला चिरेबंदी,माधव गाडगीळ,उदंड वारुळे जाहली ! ई.ओ.विल्सन संक्षिप्त अनुवाद - नंदा खरे, मनोविकास प्रकाशन…
नव्यानं बहरणाऱ्या जीवसृष्टीत एक भाग होता कोळी-प्रकाराचा.खरं तर मृत्युक्षेत्रात पहिल्यांदा आले,ते कोळी.काही शेजारच्या जंगलांमधून चालतफिरत आले.पण एक मोठा गट हवाई मार्गानं आला ! कोळ्यांना पंख नसतात.पण लहान कोळ्यांना दूर जायचं असेल,तर त्यांच्याकडे एक युक्ती असते.एखादं गवताचं पातं किंवा झुडपाची काडी पाहून उंचावर जायचं.मग बूड उचलून आपल्या रेशीम देणाऱ्या ग्रंथींमधून रेशमाचा एक तंतू हवेत उडवायचा.हा नाजुकसा तंतू एखाद्या पतंगासारखा वाऱ्यानं ओढला जातो,आणि सोबत आपला कोळीही उडी मारून हवाई-प्रवासाला लागतो.वारा योग्य दिशेचा आणि वेगाचा असला, तर कोळी तीनेकशे मीटर उंच आणि कैक किलोमीटर दूर पोचू शकतो.
उतरायची इच्छा झाली, की आपला तंतू आत ओढून खाऊन टाकायचा. कणाकणानं तंतू खात संथपणे जमिनीवर लैंडिंग करता येतं.नव्या जागी फारसे कोळी नसले,तर छान अन्न कमावत जगता येतं.
फास टाकून भक्ष्य पकडणारे कोळी असतात.मोठी चक्राकार जाळी,गुंतागुंतीची जाळी.चाडीसारखी जाळी,अशा अनेक प्रकारच्या जाळ्यांनी भक्ष्य पकडता येतं.काही कोळी तर जाळंही न विणता अचल स्वस्थ बसून राहतात,आणि भक्ष्य जवळ आलं,की झडप घालून पकडतात.
तर नव्यानं वनस्पती-श्रीमंत झालेल्या महासमाज क्षेत्रात अशी विविध प्रकारची कीटकसृष्टी बहरली आणि सोबत झुडूप-वारूळही बहरलं.
अजूनही हा वाचन प्रवास सुरु राहिल.शिल्लक भाग पुढील लेखामध्ये…¶¶¶