* विजय गायकवाड | Vijay Gaikawad

live

नमस्कार आपले स्वागत आहे. मी पुस्तके आणि मित्रांवर पैसे खर्च करतो,माझ्याकडे दगड आणि विटांवर खर्च करण्यासाठी पैसे नाहीत.- रस्किन बाँड.ही थोर माणसं व त्यांचे विचार मला पुस्तकात भेटलीत.ती भेटली आणि त्यांनी सांगितले कि, प्रत्येक दिवशी असं काही तरी करा की,ते तुम्हाला अधिक सुंदर उद्याच्या दिशेने खूप लांबवर घेऊन जाईल."- डोग फायरबाऊ.' सर्वियन कादंबरीकार मिलोराद पावीच यांचे एक वाक्य आहे ते म्हणतात - जोवर जगात पुस्तक वाचणाऱ्या वाचकांची संख्या बंदूकधारी सैनिका पेक्षा अधिक आहे तोवर काळजीच काहीच कारण नाही.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात.पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये.म्हणून अविरतपणे प्रयत्न करणारे मार्गदर्शक, मित्र धावून येतात.प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,डॉ.दीपक शेटे,आ.भरत बुटाले,प्रा.सर्जेराव राऊत,सुभाष ढगे,अनिल फारणे,डॉ.सुधीर सरवदे ,विश्वास खाडे, विनायक पाटील,संजय कुंभार,सतीश खाडे,मनोहर सुर्वे,गणेश खंदारे,तात्या गाडेकर, दादासाहेब गाडेकर, दादासाहेब ताजणे, पुस्तकातील घटना प्रसंग सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील यांनी केलेले आहे. मला लिहिण्याची प्रेरणा देणारी पुस्तके,लेखक,प्रकाशक,मित्र ही जगावेगळी माणसं माझ्या जीवनातील महत्वाचा टप्पा आहेत.... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ.मेघा गायकवाड, चिरंजीव मयान,माझ्या धावण्यातील गुरुवर्य नामदेव बरुरे,लुल्ला शेख मोठी ताई ,लहान ताई जयश्री शिंदे या सर्वांचेच मनापासून आभार व धन्यवाद मॅट्रिक फेल विजय गायकवाड

११/२/२३

आपले प्राचीन 'जलव्यवस्थापन'💧

प्राचीन काळी आपल्या देशात पाण्याचं व्यवस्थापन उत्कृष्ट होतं आणि म्हणूनच आपला देश

'सुजलाम सुफलाम' होता..!


पाण्याचं हे नियोजन किती चांगलं असावं.. ? तर जगातले पहिले ज्ञात आणि सध्याही वापरात असलेले धरण हे भारतात आहे,हे आपल्यापैकी किती लोकांना माहीत असेल..? इसवी सनाच्या दुसऱ्या शतकात,चोल राजा करिकलन याने बांधलेला 'अनईकट्ट' अथवा इंग्रजांच्या भाषेत 'ग्रांड अनिकट' (Grand Anicut) किंवा आजच्या बोलीभाषेत 'कलानाई बांध' हा तो बांध आहे.गेली अठराशे वर्षं वापरात असलेला..!!


आजकालच्या धरणांना जिथे तीस-पस्तीस वर्षांत भेगा पडतात तिथे अठराशे वर्षं सतत एखादे धरण वापरात असणं,हे एक अद्भुत आश्चर्य आहे..! नदीच्या मुख्य पात्रात बांधलेला हा बांध किंवा हे धरण ३२९ मीटर्स लांब आणि २० मीटर्स रुंद आहे. त्रिचनापल्लीपासून फक्त १५ किलोमीटर्स दूर असलेला हा बांध,कावेरी नदीच्या डेल्टा प्रदेशात उभारलेला आहे. इंग्रजांनी या धरणावर इंग्रजी संस्कार करण्याचा प्रयत्न केला होता.अत्यंत ओबड-धोबड खडकांनी बांधलेले हे धरण बघून असे निश्चित वाटते की,त्या काळात धरणे बांधण्याचे शास्त्र चांगले विकसित झाले असावे.हे धरण प्रायोगिक तत्त्वावर बांधलेले वाटत नाही,तर कुशल आणि अनुभवी व्यक्तींनी नदीच्या मुख्य प्रवाहात बांधलेले अनुभवसिद्ध धरण वाटते.याचाच अर्थ, आपल्या देशात धरणे बांधण्याचे,म्हणजेच 'जलव्यवस्थापनाचे' शास्त्र फार- फार जुने असावे.अर्थात नंतर झालेल्या विदेशी आक्रमणांमुळे ह्या प्राचीन शास्त्राचे पुरावे नष्ट झाले आणि उरले ते इतिहासात डोकावणारे कलानाई धरणांसारखे गवाक्ष..!


जगाच्या इतिहासात बघितलं तर अत्यंत प्राचीन अशी धरणे बांधल्याचे उल्लेख आढळतात. नाईल नदीवर कोशेश येथे इसवी सनाच्या २९०० वर्षे आधी बांधलेले १५ मीटर उंचीचे धरण जगातील सर्वांत जुने धरण मानण्यात येते.पण आज ते अस्तित्वात नाही.किंबहुना अर्वाचीन इतिहासकारांनी त्या धरणाला पाहिलेलेच नाही. त्याचे फक्त उल्लेख आढळतात.


इजिप्तमधे इसवी सनापूर्वी २७०० वर्षच्या सुमाराला नाईल नदीवर बांधलेल्या धरणाचे काही अवशेष आजही बघायला मिळतात. साद-अल- कफारा असं त्याचं नंतर नामकरण करण्यात आलं.कैरोपासून तीस किलोमीटर अंतरावर बांधलेले हे धरण,बांधल्यानंतर काही दिवसांतच कोसळले.त्यामुळे पुढे अनेक शतकं इजिप्तच्या लोकांनी धरणे बांधण्याची हिम्मतच केली नाही.चीनमधेही इसवी सनापूर्वी २२८० वर्षांपूर्वीच्या धरणांचे उल्लेख सापडतात.मात्र प्रत्यक्षात वापरात असलेलं इतकं जुनं एकही धरण जगभरात आढळत नाही.


भारतात मात्र कलानाई धरणाच्या नंतर बांधलेली आणि वापरात असलेली धरणे आढळतात. इसवी सन ५०० ते १३०० मधे दक्षिणेतल्या पल्लव राजांनी बांधलेल्या अनेक मातीच्या धरणांपैकी काही आजही वापरात आहेत.ते सन १०११ ते १०३७ ह्या काळात तामिळनाडूमधे बांधलेले वीरनाम धरण हे याचे उदाहरण आहे.


जलव्यवस्थापनेच्या संदर्भात बांधलेल्या अनेक रचना आजही अस्तित्वात आहेत.पूर्वी गुजरातची राजधानी असलेल्या 'पाटण' येथे बांधलेली 'रानी का वाव' ही विहीर (राजेशाही बारव) आता युनेस्कोच्या संरक्षित स्मारकांच्या यादीत गेली आहे.भूगर्भातील पाण्याला नीट खेळवण्याचे आणि साठवण्याचे हे एक उत्तम उदाहरण आहे. इसवी सन १०२२ ते १०६३ या काळात बांधण्यात आलेली ही सातमजली विहीर आजही सुस्थितीत आहे.सोळंकी राजवंशाच्या राणी उदयमती यांनी आपले पती भीमदेव यांच्या स्मरणार्थ ही विहीर बांधली होती.म्हणूनच हिचे नाव 'रानी का वाव' अर्थात 'राणीची विहीर' असे पडले.हाच काळ होता,जेव्हा सोमनाथवर महमूद गजनीने आक्रमण केले होते.विहीर बांधल्यानंतर काही वर्षांनी गुजरात हे पूर्णपणे मुस्लीम शासकांच्या ताब्यात गेलं.त्यामुळे पुढे जवळपास सातशे वर्षं ही राजेशाही विहीर चिखलाच्या गाळात दुर्लक्षित होती...!


अर्थात भूमिगत पाण्याच्या व्यवस्थापनाची माहिती आपल्याला फार पूर्वी पासून होती,हे निश्चित.

पंचमहाभूतांच्या मंदिरांसंबंधी या आधीच्या लेखात,याच लेखमालेत,उल्लेख आलेला आहे.त्यातील 'जल' संबंधीचे उल्लेख आणि जलव्यवस्था- पनाची माहिती फार प्राचीन काळापासून आपल्याला होती याचे अनेक पुरावे आपल्या समोर आहेत.ऋग्वेदात,यजुर्वेदात आपल्याला पाण्याच्या नियोजनासंबंधी अनेक सूक्ते आढळतात.धुळ्याच्या श्री.मुकुंद धाराशिवकरांनी यावर विपुल आणि अभ्यासपूर्ण लेखन केलेलं आहे.त्यांनीच प्राचीन जलव्यवस्थापनासंबंधी गो.ग.जोशी यांचाही उल्लेख केला आहे.तारापूरमधे ज्येष्ठ अभियंता असलेल्या जोशी यांचा प्राचीन शास्त्रासंबंधी चांगला व्यासंग होता.


स्थापत्यवेद हा अथर्ववेदाचा उपवेद समजला जातो.दुर्दैवाने त्याची एकही प्रत भारतात उपलब्ध नाही.युरोपमधील ग्रंथालयात याच्या काही प्रती आढळतात.यातील परिशिष्टांमधे तडाग विधी (जलाशयनिर्मिती) ची संपूर्ण माहिती दिलेली आहे.


मुकुंद धाराशिवकरांनी आणखी एका ग्रंथाचा उल्लेख केलाय,ज्याचे नाव दुर्दैवाने उपलब्ध नाही आणि शेवटचे पान नसल्याने तो कोणी लिहिलाय,हे देखील कळत नाही.अथ जलाशया प्रारम्यते... ह्या ओळीने सुरू होणाऱ्या ह्या ग्रंथात भिंत बांधून जलाशय कसा निर्माण करावा याचे सविस्तर वर्णन आहे. हा ग्रंथ २८०० वर्षांपूर्वीचा आहे.


कृषी पाराशर,कश्यप कृषी सूक्त,सहाव्या शतकात लिहिलेल्या 'सहदेव भाळकी' इत्यादी ग्रंथांत पाण्याची साठवण,पाण्याचे वाटप, पावसाचे अनुमान,जलाशय निर्मिती यांवर बरीच आणि सविस्तर माहिती आढळते..


द शिल्पशास्त्र आणि भृगु शिल्पशास्त्र यांत सागरातील किल्ले,नदीतील नारद किल्ले यांसारख्या विषयांपासून ते पाण्याची साठवण, पाण्याचे वाटप आणि पाण्याचा निचरा यावर सखोल विवेचन आढळते.भृगु शिल्पशास्त्रात पाण्याचे दहा गुणधर्म सांगितले आहेत.मात्र पाराशर मुनींनी पाण्याला एकोणीस गुणधर्म असल्याचे प्रतिपादन केले आहे.


पाण्यासंदर्भात वेदांमधे आणि विविध पुराणांमधे अनेक उल्लेख येतात.विशिष्ट परिस्थितीत पाण्याचे नियोजन कसे करावे याबाबत सविस्तर माहिती मिळते.


सन २००७ मधे योजना आयोगाने 'ग्राउंड वॉटर मॅनेजमेंट अँड ओनरशिप' हा रिपोर्ट तज्ज्ञ लोकांद्वारे लिहून प्रकाशित केला.नेटवरदेखील हा उपलब्ध आहे.मोन्टेक सिंह अहलुवालियांची प्रस्तावना ह्या रिपोर्टला आहे.या रिपोर्टच्या सुरुवातीलाच ऋग्वेदातील पाण्यासंबंधीची एक ऋचा वापरली आहे -


The waters of sky, 

the waters of rivers,

and water in the well,

whose source is the ocean, 

may all these sacred waters protect me.


नंतर रिपोर्ट लिहिण्याची सुरुवात करताना प्राचीन भारतीय शास्त्रानुसार जलव्यवस्थापन हे किती शास्त्रशुद्ध होतं,याचं विवेचन केलं आहे..!


मात्र जलव्यवस्थापनासंबंधी अत्यंत विस्तृत विवेचन केलंय 'वराहमिहिर' ने याचे राहणे उज्जैनला होते.तेव्हा उज्जैनचे महाराजा होते, 


'सम्राट विक्रमादित्य' वराहमिहिरने सन ५०५ च्या सुमारास विविध विषयांवरील अभ्यासाला सुरुवात केली आणि सन ५८७ मधे तो वारला. याचाच अर्थ,जवळपास ऐंशी वर्ष वराह मिहिराने ज्ञानसाधनेत खर्च केले.


वराहमिहिराचे प्रमुख कार्य म्हणजे त्याने लिहिलेला 'बृहत्संहिता' नावाचा ज्ञानकोश.या कोशात उदकार्गल (पाण्याची साठवण) नावाचा ५४ क्रमांकाचा अध्याय आहे.१२५ श्लोकांच्या ह्या अध्यायात वराहमिहिरांनी जी माहिती दिली आहे,ती अद्भूत आहे,अक्षरशः थक्क करणारी आहे.


भूगर्भामधे पाण्याचा शोध कसा घेता येऊ शकतो,यासंबंधीचे श्लोक आहेत,जे आजही आपल्याला चकित करतात.वराहमिहिराने जमिनीच्या आतील पाणी शोधताना मुख्यतः 


तीन गोष्टींच्या निरीक्षणावर भर दिलेला आहे. त्यात त्या भागात उपलब्ध असलेली झाडं, झाडांजवळ असलेली वारुळे,त्या वारुळाची दिशा,त्यात राहणारा प्राणी आणि तिथल्या जमिनीचा रंग,पोत आणि तिची चव यांचा समावेश आहे..! या निरीक्षणांच्या आधारे जमिनीच्या आतील पाणी नक्की शोधता येईल असे त्याचे म्हणणे आहे


लक्षात घ्या,दीड हजार वर्षांच्याही आधी,काहीही आधुनिक संसाधने माहीत नसताना,वराहमिहिर हे ठाम प्रतिपादन करतोय..!!


मात्र हे सर्व करताना वराहमिहिराने आजच्या वैज्ञानिकांसारख्या नोंदी करून ठेवल्या,ज्या महत्त्वपूर्ण आहेत.त्याने पंचावन्न वृक्ष व वनस्पतींचा अभ्यास करून मांडणी केली आहे. त्याचप्रमाणे त्याने मातीचे वर्गीकरण देखील विस्ताराने केले आहे.ह्या सर्व निरीक्षणांचे निकषही त्याने मांडून ठेवले आहेत. त्यांतील काही -


१. भरपूर फांद्या तेलकट साल असलेले ठेंगणे झाड असेल तर पाणी आढळते.


२. उन्हाळ्यात जमिनीतून वाफा येताना दिसल्या तर पृष्ठभागाजवळ पाणी असते.


३. झाडाची एकच फांदी जमिनीकडे झुकलेली असेल तर तिच्या खालील भागात पाणी आढळते.


४. जेव्हा जमीन गरम झालेली असते तेव्हा एखाद्याच ठिकाणी ती थंड लागली तर तिथे पाणी असते.


५. काटेरी झाडांचे काटे बोथटलेले असतील तर हमखास पाणी मिळते....


वगैरे,अशी अनेक निरीक्षणे त्याने नोंदवलेली आहेत. खरी गंमत तर पुढेच आहे.


वराहमिहिराचे हे प्रतिपादन खरं की खोटं,हे ठरविण्यासाठी आंध्र प्रदेशातल्या तिरुपतीमधल्या श्रीवेंकटेश्वर (एस.व्ही.) विद्यापीठाने सुमारे पंधरा-सोळा वर्षांपूर्वी प्रत्यक्ष विहिरी खोदून पाहायचे ठरविले.वराहमिहिराच्या निरीक्षणानुसार पाणी मिळण्यास योग्य ठरतील अशा जागा निवडल्या आणि सुमारे ३०० बोअर घेतले.

(बोअरवेल खणल्या) आश्चर्य म्हणजे ९५% ठिकाणी पाणी लागले.


अर्थात वराहमिहिराचे निरीक्षण योग्य होते हे सिद्ध झाले.मात्र पुढे दुर्दैवाने हा प्रकल्प सरकारी लालफीतशाहीत अडकला आणि तो लोकांपर्यंत पोहोचू शकला नाही..!


पाण्याच्या व्यवस्थापनाची अनेक उदाहरणं आपल्याला इंग्रजाचे शासन येण्याच्या आधीपर्यंत ठिकठिकाणी दिसतात.अगदी उत्तर पेशवाईत औरंगाबाद येथे बांधलेले 'थत्ते नहर' असो, की पुण्याला पेशव्यांच्या काळात केलेली पाणीपुरवठ्याची रचना असो.बऱ्हाणपूरला आजही अस्तित्वात असलेली,पाचशे वर्षांपूर्वीची पाणी वाहून नेण्याची रचना असो,की पंढरपूर-अकलूज रस्त्यावरील वेळापूर गावात सातवाहन कालीन बांधलेली बारव असो. 'समरांगण सूत्रधार' ह्या ग्रंथाच्या आधाराने राजा भोजने बांधलेला भोपाळचा मोठा तलाव असो... अशी कितीतरी उदाहरणं देता येतील.


गढा-मंडला (जबलपूर संभाग) आणि चंद्रपूर या भागात प्राचीन काळापासून गोंडांचं राज्य होतं. अगदी मुगलांना,आदिलशाहीला किंवा कुतुबशाहीला सुद्धा त्यांना जिंकता आलं नव्हतं. मात्र तरीही आपल्या देशात हा प्रदेश म्हणजे मागासलेला मानला गेला.अर्थात खरं चित्र तसं नव्हतं.एक खूप सुरेख हिंदी पुस्तक आहे- 'गोंडकालीन जल-व्यवस्थापन'यात सुमारे पाचशे ते आठशे वर्षांपूर्वी गोंड साम्राज्यात किती उत्कृष्टपणे पाण्याचं नियोजन केलं होतं याचं वर्णन आहे.या नियोजनाचा फायदा म्हणजे कुठल्याही दुष्काळाची किंवा अवर्षणाची झळ ह्या गोंड प्रदेशाला कधीही लागली नाही.


आमच्या जबलपूर शहरात गोंड राणी दुर्गावतीच्या काळात (अर्थात पाचशे वर्षांपूर्वी) 'बावनताल आणि बहात्तर तलैय्या' बांधले गेले (तलैय्या- लहान तलाव).हे तलाव नुसतेच खोदून बांधले गेले नव्हते,तर जमिनीच्या 'कंटूर' प्रमाणे त्यांची रचना आहे.काही तलाव तर आतून एक-दुसऱ्याशी जोडले गेलेले आहेत.आज त्यांतले अनेक बुजले असूनही उरलेल्या तलावांमुळे जबलपूरमधे,अगदी आजही पाण्याची पातळी बऱ्यापैकी चांगली आहे आणि येथे पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवत नाही.मग त्या काळात पाण्याची,शेतीची आणि निसर्गाची काय समृद्धी असेल..!!


याचाच अर्थ,पाण्याचे महत्त्व,पाण्याचा शोध आणि पाण्याचे नियोजन याचे संपूर्ण विकसित तंत्रज्ञान आपल्याजवळ होते.काही हजार वर्षांपासून आपण ते प्रभावी पद्धतीने वापरत होतो.आणि म्हणूनच आपला देश खऱ्या अर्थाने सुजलाम सुफलाम होता..!


मात्र आपल्यापैकी अनेकांच्या मनावर इंग्रजांचे असे जबरदस्त गारुड आहे की अनेकांना आज ही असे वाटते की आपल्या देशात पाण्याचे महत्त्व ओळखले ते इंग्रजांनी.आपल्याला धरणे बांधायला शिकवले ते इंग्रजांनी..!


दुर्दैवाने आपण आपलं प्राचीन जलव्यवस्थापन विसरलो अन् आज पाण्यासाठी आपण त्राही-त्राही करतोय,१४४ कलमं लावतोय,युद्ध खेळतोय..!!


आपल्यालाच आपल्या समृद्ध ज्ञानाचा,वारशाचा आणि तंत्रज्ञानाचा विसर पडला तर हे असं होणं अटळ आहे..!!


९ डिसेंबर २०२३ ला लेखातील पुढील भाग..

९/२/२३

भारताच्या प्राचीन कला - २

छत्तीसगढला आपण ओळखतो ते नक्षलवादाने ग्रस्त असलेला एक अशांत प्रदेश म्हणून.पण छत्तीसगढचे हे चित्र खरे नाही.नक्षलवादाशिवाय बऱ्याच गोष्टी या प्रदेशात आहेत, ज्या छत्तीसगढला संपन्न करून गेल्या आहेत.प्राचीन काळातील अनेक अवशेष येथे आढळतात.दुर्गम असल्याने मुसलमानी आक्रमणाच्या काळात ह्या प्रांतात विध्वंस तुलनेने कमी झाला.आणि म्हणूनच काही महत्त्वाच्या जागा ह्या शिल्लक राहिल्या.


अशा जागांपैकी एक आहे सीता बेंगारा गुफा. छत्तीसगढची राजधानी असलेल्या रायपूरपासून २८० कि.मी.अंतरावर असलेल्या,सरगुजा जिल्ह्यातील रामगढ गावाजवळ ही गुफा आहे. हा संपूर्ण पर्वतीय भाग आहे.मात्र रामगढ पर्यंतचा रस्ता हा बिलासपूर - अंबिकापूर मार्गावर असल्याने चांगला आहे.


इतकं विशेषत्वानं उल्लेख केलेल्या ह्या गुहेचं वैशिष्ट्य काय ?


ही गुहा म्हणजे आशिया खंडातील (आणि कदाचित जगातील ) पहिले ज्ञात जगातील ) नाट्यगृह आहे..!!


ह्या गुहेतील भित्तीचित्रांच्या आधारे ह्या गुहेचा वापरात असण्याचा कालखंड हा इसवी सनापूर्वी दोनशे ते तीनशे वर्षे असा केला जातो.ह्या गुहेत तीन कक्ष आहेत.त्यांतील एक मोठा आहे.हा मोठा असलेला कक्ष म्हणजेच पन्नास ते साठ दर्शकांच्या बसण्याची जागा आणि रंगमंच आहे. अशी मान्यता आहे की,कवी कालिदासाने 'मेघदूत' ह्या महाकाव्याची रचना येथे बसूनच केली होती.


मात्र आपलं दुर्दैव की,सामान्य माणूस तर सोडाच,पण कलेच्या क्षेत्रात मुक्त विचरण करणाऱ्या आणि वेळोवेळी ग्रीक,रोमन,फ्रेंच आणि ब्रिटिश रंगभूमीचे दाखले देणाऱ्या कलावंतांनाही ही गुफा माहीत नाही..


ह्या गुहेचा मुख्य कक्ष ४४ फूट लांब आणि २० फूट रुंद आहे.भिंती सरळ आहेत,तर प्रवेशद्वार गोल आकारात आहे.पूर्णपणे बंदिस्त असलेल्या ह्या गुहेत प्रतिध्वनी नष्ट (suppress) करण्यासाठी काही ठिकाणी भिंतींना भोकं केलेली आहेत.गुहेचा अर्धा भाग हा रंगमंचासारखा,तर उरलेला अर्धा हा प्रेक्षक दीर्घा आहे.येथे रंगमंचाचा भाग हा खाली आणि गुहेतला अर्धगोलाकार भाग हा कापून त्याला पायऱ्याच्या स्वरूपात तयार केलेले आहे. हीच ती दर्शक दीर्घा.


ह्या गुहेत ब्राम्ही लिपीत लिहिलेला आणि पाली भाषेत असलेला एक शिलालेख आढळला आहे. त्यावरील मजकुराचा आशय आहे-


'हृदयाला देदीप्यमान करतात,स्वभावाने महान असलेले कविगण रात्री,वासंती हून दूर

हास्य आणि विनोदात स्वतःला हरवून ते चमेलीच्या फुलांच्या माळेचं आलिंगन करतात..'


ही सीता बेंगारा गुफा ज्या रामगढ गावाजवळ आहे,तिथेच काही अंतरावर जोगीमारा गुफा सुद्धा आहे.या गुहेत इसवी सनापूर्वी तीनशे वर्षे काढलेली काही रंगीत भित्तीचित्रे आहेत,जी वेगवेगळ्या कलांची अभिव्यक्ती दाखवतात.


यात एक नृत्यांगना बसलेली आहे,जी गायक आणि नर्तकांच्या गर्दीने वेढलेली आहे.याशिवाय नाट्यगृह आणि मनुष्यांच्या आकृत्याही रेखाटलेल्या दिसतात.


डॉ.टी.ब्लॉख ह्या जर्मन पुरातत्त्ववेत्त्याच्या अनुसार ही भित्तीचित्रे सम्राट अशोकाच्या काळातली आहेत.अर्थात अजिंठ्याच्या आधी काढलेली..!


एकुणात काय,तर रामगढच्या क्षेत्रात असलेल्या सीता बेंगारा आणि जोगीमार ह्या गुहा तत्कालीन कलेचं केंद्र असाव्यात.सीता बेंगारा ही नाट्यगृहाच्या रूपात विकसित असलेली गुहा असावी.मात्र काही लोकाना हे मान्य नाही. त्यांच्या मते सीता बेंगारा हे कलेचं केंद्र असेलही. पण ते नाट्यगृह नव्हतं. का..? तर भरत मुनींनी त्यांच्या नाट्यशास्त्र ह्या ग्रंथात 'नाट्यगृहाची' जी मापं दिलेली आहेत,त्यानुसार या गुहेची रचना नाही म्हणून.. !!


पण येथे हे लक्षात घेतले पाहिजे की,भरत मुनींचा काळ हा त्याच सुमारासचा आहे.त्यामुळे भरत मुनींच्या नाट्यशास्त्राप्रमाणे ह्या गुहेची रचना होणे शक्य नाही.आणि खाली रंगमंच व अर्धचंद्राकृती उभ्या पायऱ्यांवर बसलेले दर्शक, हीच रचना ग्रीक रंगमंचाचीही आहे.


याचा अर्थ असा की,आपल्या देशात भरत मुनींच्या नाट्यशास्त्रापूर्वीही नाट्य आणि इतर कलांचे वास्तव्य होते.म्हणजेच भरत मुनी नाट्यशास्त्राची नवीन व्याख्या करत नाहीत,तर आधीच असलेल्या कलेच्या ह्या प्रांताला व्यवस्थितपणे,सुसूत्रपणे आपल्यासमोर ठेवताहेत.याचाच अर्थ,आपल्या देशात प्रगल्भ अशी नाट्यकला ही तीन हजार वर्षांपेक्षाही जास्त प्राचीन आहे.


आणि भरत मुनींच्या नाट्यशास्त्राचं हेच मोठं वैशिष्ट्य आहे.त्यांनी नाट्यकलेचं भारतात असलेलं अस्तित्व व्यवस्थितपणे मांडलं आणि जगानंही ते मान्य केलं.


जगात नाट्यकलेविषयी प्राचीन प्रवाह दोनच आढळतात.ग्रीकची रंगभूमी आणि आपल्या भारतातली रंगभूमी.


ग्रीकवर परकीय आक्रमणं फारशी झाली नाहीत.त्यामुळे तेथील रंगभूमीचे प्राचीन अवशेष आजही आपल्याला बघायला मिळतात.


इसवी सनापूर्वी पाचव्या शतकात ग्रीक रंगभूमीचे उल्लेख मिळतात.त्या काळात बांधलेले भव्य नाट्यगृह आजही अस्तित्वात आहे.


ग्रीक वास्तुकारांनी डोंगराच्या उताराचा फायदा घेऊन टप्पे निर्माण केले व प्रेक्षकांच्या बसण्याची सोय केली. 'एपिडोरस' या एम्फी थिएटरमधे अशा टप्प्यांवर सहा हजार लोकांच्या बसण्याची सोय होती (मराठी विश्वकोश).


ग्रीक व रोमन रंगमंडलात वाद्यवृन्दासाठी मध्यवर्ती मोठी वर्तुळाकृती जागा पायऱ्यांच्या तळाशी योजण्यात येत असे.सरगुजा जिल्ह्यातील रामगढमधे आढळलेल्या सीता बेंगारा गुफेतही अशीच रचना आढळते.


मग प्रश्न असा पडतो की,इसवी सनापूर्वी ४०० ते ५०० वर्षांपूर्वी ग्रीसमधे बांधलेल्या नाट्यगृहासारखीच रचना,फक्त पुढच्या शंभर / दोनशे वर्षांत भारतातल्या अगदी आतल्या बाजूस असलेल्या डोंगराळ आणि दुर्ग प्रदेशात कशी निर्माण झाली..?


म्हणजे भारतीय रंगमंचाविषयीच्या माहितीच्या आधारे ग्रीकांनी आपली रंगभूमी उभारली? की त्याच्या अगदी उलट घडले..? इसवी सनापूर्वी ३३३ व्या वर्षी ग्रीसच्या मॅसेडोनियाचा राजा अलेक्झांडर हा मरण पावला. तो भारतात येण्यापूर्वीच भारत आणि ग्रीस यांच्यात बरेच संबंध होते असं आता सिद्ध होतय.


मीना प्रभू या लेखिकेनं जगभर प्रवास केलाय अन् त्याची फार सुंदर वर्णन त्यांच्या पुस्तकात करून ठेवली आहेत.त्यातीलच एक पुस्तक आहे - 'ग्रीकांजली' त्यांच्या तीन आठवड्यांच्या ग्रीस प्रवासाचं त्यात त्यांनी लिहिलंय की,ज्या घरात त्या काही दिवस 'गेस्ट' म्हणून राहिल्या,त्या घराचा कुटुंबप्रमुखच पुरातत्त्ववेत्ता आणि भारताची बरीच माहिती असलेला होता.त्याने मीना प्रभूंना सांगितले की,ग्रीसने भारताकडून बरेच काही घेतलंय.अनेक प्राचीन ग्रीक विद्वानांना संस्कृत भाषा येत होती.इतकेच नाही, तर ग्रीक भाषेतील अनेक शब्द संस्कृतमधून आले आहेत.मीना प्रभूंनी त्या शब्दांची यादीच दिलीय.


गंमत म्हणजे,ग्रीक भाषेमधे 'शब्दाला' समानार्थी शब्द आहे-'अब्द' तो ऐकून मीना प्रभूंना मर्ढेकरांची कविता आठवते -


किती पाय लागु तुझ्या

किती आठवू गा तूंते, 

किती शब्द बनवू गां

अब्द अब्द मनी येते..!


थोडक्यात काय,तर संस्कृत भाषेप्रमाणेच नाट्यकलेसारख्या इतरही गोष्टी ग्रीसमधे गेल्या असतील हे मानायला बरीच जागा आहे.


मात्र ही तुलना क्षणभरासाठी बाजूला जरी ठेवली,तरी आपल्या देशात हजारो वर्षांपूर्वी एक समृद्ध संस्कृती नांदत होती,ज्यात गायन,वादन, नाट्य यांसारख्या कलाप्रकारांना महत्त्व होतं. नाट्यशास्त्राची बीजं ही ऋग्वेदात आणि सामवेदात आहेत,हे आपण मागच्या लेखात बघितलंच आहे.इसवी सनापूर्वी पाचशे वर्षांपूर्वीच्या काळात पाणिनीने संस्कृतचे व्याकरण लिहिले.त्यातही नाट्यशास्त्रासंबंधी उल्लेख मिळतात.यात शिलाली आणि कृशाश्व ह्या दोन नट सूत्रधारांचा उल्लेख प्रामुख्याने येतो. यातील शिलालीचा उल्लेख यजुर्वेदीय शतपथ ब्राम्हण आणि सामवेदीय अनुपद सूत्रांत मिळतो. या विषयातील तज्ज्ञांनी ज्योतिषीय गणनेनुसार शतपथ ब्राम्हणांना चार हजार वर्षांपेक्षाही प्राचीन म्हटले आहे.


अत्यंत प्राचीन मानल्या गेलेल्या अग्निपुराणात ही नाटकांची लक्षणे वगैरे विस्ताराने दिलेली आहेत.मंगलाचरण,पूर्वरंग सारखे,नाटकांच्या रचनेतील,यांचा विशेषत्वाने उल्लेख होतो.या सर्व पुराव्यांवरून,विल्सनसारख्या भाग,


पाश्चात्त्य पुरातत्त्ववेत्त्यांनी हे कबूल केले आहे की,भारतीय नाट्यकला ही बाहेरून आलेली नाही,तर मुळात इथेच विकसित झालेली आहे.


एक गोष्ट मात्र नक्कीच की,भरत मुनींनी नाट्यशास्त्र हा ग्रंथ लिहून भारतीय नाट्यकलेला एक सुव्यवस्थित आकार दिला.संगीत,अभिनय आणि नाटक यांचे परिपूर्ण विवेचन करणारा हा ग्रंथ इसवी सनापूर्वी साधारण ३०० ते ४०० वर्षांपूर्वी लिहिला गेला असावा.काहींच्या मते ह्या ग्रंथात ३७ अध्याय होते. आज मात्र उपलब्ध असलेल्या ग्रंथात ३६ अध्याय आढळतात.


या ग्रंथात भरत मुनींनी नाट्यशास्त्राची जी खोलात जाऊन चिकित्सा केलीय,ती बघून अक्षरशः थक्क व्हायला होतं.गंमत म्हणजे आपण नाटकांच्या लांबीसाठी दोन अंकी,तीन अंकी नाटक असे जे शब्द वापरतो,त्यातील 'अंक' हा शब्द याचं अर्थाने भरत मुनीही वापरतात.मात्र त्यांना त्याचा अर्थ माहीत नाही, कारण भरत मुनींच्या मते 'अंक' हा शब्द पूर्वीपासून चालत आलेला (रूढीबद्ध) आहे. म्हणून त्यांनीही तो तसाच वापरला आहे.याचाच अर्थ,भारतीय नाट्यशास्त्र हा प्रकार,भरत मुनींच्याही कितीतरी आधीपासून चालत आलेला आहे...


नाटकातील पात्रे,सूत्रधार,नायक,नायिका, पीठमर्द (नायकाचा साथीदार,जो त्याची काळजी घेतो),वीट (धूर्त नागरिक),चेट,विदूषक इत्यादी अनेक पात्रांबद्दल भरत मुनींनी विस्ताराने लिहिले आहे.नाटकाची रचना किंवा आकृतिबंध तयार करताना भरत मुनींनी पाच अर्थप्रकृती दाखविल्या आहेत - बीज,बिंदू,पताका,प्रकरी आणि कार्य.याचप्रमाणे नाटकाच्या पाच अवस्था, पाच संधी यांचेही विस्तृत विवरण आहे.


भरत मुनींनी ज्याचा उल्लेख केला आहे, असे पहिले नाटक म्हणजे 'समवकार अमृतमंथन'.

'भास' हा नाटककार,भरत मुनींच्या समकालीन किंवा शंभर वर्षे नंतरचा.भास हा कवी होता, पण त्याहीपेक्षा जास्त नाटककार होता.पुढे प्रसिद्ध झालेल्या कालिदासाने आणि बाणभट्टानेही भासच्या नाटकांची प्रशंसा केलेली आढळते.


भासाचा उल्लेख जरी अनेक ठिकाणी होत असला,तरी भासाने लिहिलेली नाटके ही काळाच्या उदरात गडप झालेली होती.पुढे सन १९१२ मधे त्रावणकोर संस्थानातील एका मठात, ताडपत्रांवर मल्याळी लिपीत लिहिलेली भासाची संस्कृत नाटके,टी.गणपती शास्त्री ह्या संशोधकाला मिळाली.मिळालेल्या नाटकांची संख्या तेरा आहे.मात्र भासांनी याहूनही अधिक नाटकं लिहिली असावीत हे उपलब्ध उल्लेखांवरून समजतं.कृष्णाजी लक्ष्मण सोमण ह्यांनी भासाची ही नाटकं १९३१ साली पहिल्यांदा मराठीत आणली.सध्या रंगमंचावर असणारं 'प्रिया बावरी' हे नाटक महाकवी भास रचित 'मध्यमाव्यायोग' या संस्कृत नाटकावर आधारलेले आहे.


थोडक्यात काय,तर भारतीय नाट्यकलेला अत्यंत पुरातन,प्राचीन अशी वैभवशाली परंपरा आहे.जगातील पहिले नाटक भारतीय भाषेत लिहिले गेले असावे ह्याचे पुरावे मिळताहेत.

मात्र आपलं दुर्दैव असं की आजही नाट्य व्यवसायात असलेली तथाकथित बुद्धिजीवी मंडळी ग्रीक,इटालियन,फ्रेंच आणि इंग्रजी नाटकांचेच संदर्भ तोंडावर फेकतात.आजही सार्त्र,शेक्सपिअर,शा,इब्सन,चेखोव्ह यांनाच नाट्यकलेतील आदर्श मानले जाते. ही सर्व मंडळी आहेतही तशी उत्तुंग.पण म्हणून कालातीत प्रतिभा असणाऱ्या भरतमुनी,भास, कालिदास,बाणभट्ट यांची उपेक्षा का..?


नाट्यकलेचा तेजस्वी वारसा आम्ही बाळगतोय, ही जाणीव जरी आपल्याला झाली तरी पुष्कळ आहे..!


३ फेब्रुवारी २०२३ लेखामधील पुढील भाग..

७/२/२३

दिनांक ३० डिसेंबर १९३० रोजी इंग्लंड वरून डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांनी रमाई यांना लिहिलेले पत्र आजही काळजाला पिळून टाकतं•

रमा !

कशी आहेस रमा तू? तुझी, यशवंताची आज मला खूप आठवण आली. तुमच्या आठवणीनं मन खूपच हळवं झालं आहे आज मागल्या काही दिवसातली माझी भाषणे फारच गाजली. परिषदेतील सर्वोत्कृष्ट भाषणे,प्रभावी वक्तृत्वाचा सर्वोत्कृष्ट नमुना असे माझ्या भाषणांबद्दल इकडच्या वर्तमानपत्रांमधून लिहून आले आहे. या पहिल्या गोलमेज परिषदेतील माझ्या भूमिकेचा विचार मी करीत होतो.आणि डोळयापुढे आपल्या देशातील सर्व पीडितांचे संसार माझ्या डोळयासमोर उभे राहिले.


दुःखांच्या डोंगराखाली ही माणसे हजारो वर्षे गाडली गेली आहेत.या गाडलेपणाला पर्याय नाही हीच त्यांची समजूत आहे.मी हैराण होतो आहे रमा ! पण मी झुंज देतो आहे.माझी बौध्दिक शक्ती परमवीर झाली होती जणू ! खूप भावना मनात दाटून आल्या आहेत.खूपच हळवे झाले आहे मन खूपच व्याकूळ झाले आहे मन! आणि घरातल्या तुम्हा सर्वांची आठवण आली. तुझी आठवण आली.यशवंताची आठवण आली.


मला तू बोटीवर पोचवायला आली होतीस.मी नको म्हणत होतो तरी तुझे मन तुला धरवले नाही.तू मला पोचवायला आली होतीस. मी गोलमेज परिषदेला जात होतो.माझा सर्वत्र जयजयकार सुरु होता.तू पाहत होतीस.तुझं मन गदगदून आलं होतं.कृतार्थतेनं तू ओथंबून आली होतीस.तू शब्दांनी बोलत नव्हतीस;पण तुझे डोळे जे शब्दांना सांगता येत नसते तेही सांगत होते.तुझं मौन शब्दाहून अधिक बोलकं झालं होतं.तुझ्या गळयातील आवंढा तुझ्या ओठापर्यंत येऊन थडकत होता.ओठातील शब्दांच्या भाषेपेक्षा डोळयातील आसवांचीच भाषा त्यावेळी तुझ्या मदतीला धावली होती.


आणि आता इथे लंडनमध्ये या साऱ्याच गोष्टी मनात उभ्या राहिल्या आहेत.मन नाजूक झाले आहे.जीवात कालवाकालव होत आहे.कशी आहेस रमा तू ! आपला यशवंत कसा आहे? माझी आठवण काढतो तो? त्याचे संधीवाताचे दुखणे कसे आहे? त्याला जप रमा ! आपली चार मुलं आपल्याला सोडून गेलीत.आता आहे फक्त यशवंत.तोच तुझ्या मातृत्त्वाचा आधार आहे आता.त्याला आपण जपलं पाहिजे.यशवंताची काळजी घे रमा ! यशवंताला खूप अभ्यास करायला लाव.त्याला रात्री अभ्यासाला उठवीत जा. माझे बाबा मला अभ्यासासाठी रात्री उठवीत.तोवर ते जागे राहत.मला ती शिस्तच त्यांनी लावली.मी उठलो,अभ्यास सुरु केला की ते झोपत असत.अगदी प्रारंभी मला रात्री अभ्यासाला उठण्याचा कंटाळा येई.त्यावेळी अभ्यासापेक्षा झोप महत्त्वाची वाटे.पुढे तर आयुष्यभरासाठी झोपेपेक्षा अभ्यासच मोलाचा वाटत राहिला.याचं सर्वात जास्त श्रेय माझ्या बाबांना आहे.माझ्या अभ्यासाची वात तेवत राहावी म्हणून माझे बाबा तेलासारखे जळत राहत.त्यांनी रात्रीचा दिवस केला.अंधाराचा उजेड केला.माझ्या बाबांच्या कष्टांना आता फळे आली.फार फार आनंद वाटतो रमा आज रमा यशवंताच्या मनाला असाच अभ्यासाचा छंद लागला पाहिजे.ग्रंथाचा त्याने ध्यास घेतला पाहिजे.


रमा,वैभव,श्रीमंती या गोष्टी निरर्थक आहेत.तू अवतीभोवती पाहते आहेसच.माणसं अशाच गोष्टींच्या सारखी मागे लागलेली असतात.त्यांची जीवनं जिथून सुरु होतात तिथच थांबलेली असतात. 


या लोकांची आयुष्ये जागा बदलीत नाहीत.आपल्याला असं जगून चालायचं नाही रमा.आपल्याजवळ दुःखांशिवाय दुसरं काहीच नाही.दारिद्रय,गरिबी यांच्याशिवाय आपल्याला सोबत नाही.अडचणी आणि संकटे आपल्याला सोडीत नाहीत.अपमान,छळ,अवहेलना या गोष्टी आपल्याला सावलीसारख्या जखडलेल्या आहेत.


मागे अंधारच आहे.दुःखाचे समुद्रच आहेत. आपला सूर्योदय आपणच झाले पाहिजे रमा. आपणच आपला मार्ग झाले पाहिजे.त्या मार्गावर दिव्यांची ओळ आपणच झाले पाहिजे. त्या मार्गावर जिद्दीचा प्रवास आपणच झाले पाहिजे.


आपणाला दुनिया नाही.आपली दुनिया आपणच निर्माण केली पाहिजे.आपण असे आहोत रमा. म्हणून म्हणतो यशवंताला खूप अभ्यास करायला लाव.त्याच्या कपडयांची काळजी घे.त्याची समजूत घाल.त्याच्यात जिद्द जागव.मला तुझी सारखी आठवण येते.यशवंताची आठवण येते.


मला कळत नाही असं नाही रमा,मला कळतं की तू दुःखांच्या या वणव्यात स्वतः करपून जात आहेस.पाने गळत जावीत आणि जीव सुकत जावा त्याप्रमाणे तू होते आहेस.पण रमा मी तरी काय करु ! एका बाजूने हात धुवून पाठीशी लागलेले दारिद्रय.दुसऱ्या बाजूने माझ्या जिद्दीने घेतलेला वसा.वसा ज्ञानाचा !


मी ज्ञानाचा सागर उपसतो आहे.मला इतर कशाचे यावेळी भान नाही;पण ही शक्ती मला मिळवण्यात तुझाही वाटा आहे.तू इथे माझा संसार शिवत बसली आहेस.आसवांचे पाणी घालून माझे मनोबल वाढवीत आहेस.म्हणून मी बेभान मनानं ज्ञानाच्या तळगर्भाचा वेध घेतो आहे.


खरं सांगू रमा,मी निर्दय नाही.पण जिद्दीचे पंख पसरून आकाशात उडणाऱ्या मला कोणी सादही घातली,तरी यातना होतात.माझ्या मनाला खरचटतं आणि माझ्या रागाचा भडका उडतो. मलाही हृदय आहे रमा ! मी कळवळतो. पण मी बांधलो गेलो आहे क्रांतीशी ! म्हणून मला माझ्या स्वतःच्या भावना चितेवर चढवाव्या लागतात. त्याच्या तुला,यशवंतालाही कधी झळा पोचतात. हे खरं आहे;पण यावेळी रमा मी हे उजव्या हाताने लिहितो आहे आणि डाव्या हाताने अनावर झालेली आसवे पुसतो आहे.सुडक्याला सांभाळ रमा.त्याला मारु नको.मी त्याला असे मारले होते.त्याची आठवणही कधी त्याला करुन देऊ नको.तोच आता तुझ्या काळजाचा एकुलता एक घड आहे.


माणसांच्या धार्मिक गुलामगिरीचा,आर्थिक आणि सामाजिक उच्चनीचतेचा आणि मानसिक गुलामगिरीचा पत्ता मला शोधायचा आहे. माणसाच्या जीवनात या गोष्टी ठाण मांडून बसलेल्या आहेत.त्यांना पार जाळून-पुरुन टाकता आला पाहिजे. समाजाच्या स्मरणातून आणि संस्कारातूनही या गोष्टी नाहीशा झाल्या पाहिजेत.


रमा ! तू हे वाचते आहेस आणि तुझ्या डोळयात आसवं आली आहेत.कंठ दाटला आहे. तुझं काळीज थरथरायला लागलं आहे.ओठ कापू लागले आहेत. मनात उभे राहिलेले शब्द ओठापर्यंत चालतही येऊ शकत नाहीत. इतकी तू व्याकूळ झाली आहेस.


रमा, तू माझ्या आयुष्यात आली नसतीस तर? तू मनःसाथी म्हणून मिळाली नसतीस तर? तर काय झालं असतं? केवळ संसारसुखाला ध्येय समजणारी स्त्री मला सोडून गेली असती. अर्धपोटी राहणे, गोवऱ्या वेचायला जाणे वा शेण वेचून त्याच्या गोवऱ्या थापणे किंवा गोवऱ्या थापायच्या कामावर जाणे कोणाला आवडेल? स्वयंपाकासाठी इंधन गोळा करायला जाणे, मुंबईत कोण पसंत करील.घराला ठिगळे लावणे, वस्त्रांना शिवत राहणे,एवढयाच काडयाच्या पेटीत महिना निभला पाहिजे,एवढेच धान्य, एवढेच तेलमीठ पुरले पाहिजे.हे माझ्या मुखातून बाहेर पडलेले गरिबीचे आदेश तुला गोड वाटले नसते तर? तर माझे मन फाटून गेले असते. माझ्या जिद्दीला तडे गेले असते. मला भरती येत गेली असती आणि तिला त्या त्या वेळी लगेच ओहोटीही लागली असती.माझ्या स्वप्नांचा खेळच पार विस्कटून गेला असता रमा ! माझ्या जीवनाचा सगळा सूरच बेसूर झाला असता, सगळीच मोडतोड झाली असती. सगळाच मनःस्ताप झाला असता.मी कदाचित खुरटी वनस्पतीच झालो असतो.जप स्वतःला जशी जपतेस मला.लवकरच यायला निघेन काळजी करु नकोस.


सर्वांस कुशल सांग.

कळावे,

तुझा

भीमराव

लंडनD⅓⁷


आमचे मार्गदर्शक परमित्र दादाराव ताजने यांनी व्हॉट्सऍप वर पाठविलेले पत्र..

५/२/२३

क्रांतिकारी मानवी मनाच्या जाणीवेचा वैचारिक असा मार्गदर्शक ग्रंथ शोध संत रविदासांचा...!

ब्रिटिश डॉक्टर फ्रँक रायन यांनी आपल्या, 

( Ryan 2002, Page 16 ) 'डार्विन्स ब्लाइंड स्पॉट'या पुस्तकात जीवसृष्टीत 'सिंबायोटिक' म्हणजेच सहजीवी नातेसंबंध असतात.या अनुषंगाने उदाहरण दिले आहे.गोबी मासा आणि एक प्रकारचा शिंपला एकमेकांच्या सहाय्याने राहतात. शिंपला अन्न मिळवतो,तर गोबी मासा संरक्षण पुरवतो.'हर्मिट' खेकड्याची एक प्रजाती एका गुलाबी ॲनेमोन प्राण्याला स्वतःच्या कवचावर राहू देते.मोठे मासे ऑक्टोपस हर्मिट खेकड्याला खाऊ पाहतात,तेव्हा ॲनेमोन हा प्राणी आपले चमकदार रंगीत तंतू फिस्कारून त्यातील विष त्या शत्रूंवर उधळतो,त्यामुळेच त्या भक्षक प्राण्यांना हर्मिट खेकड्याचा नाद सोडून पळ काढावा लागतो,हे सर्वज्ञात आहे. या विलक्षण सुरक्षेबद्दल ॲनेमोनला खेकड्याने खाऊन उरलेले अन्न मिळते.जे त्याला पुरेसे असते.


'द बायोलॉजी ऑफ बिलीफ'

हे पुस्तक समजून घेवून हातातून बाजूला ठेवले...!


आणखी परत सुरु झाला अंगावर रोमांच उभा करणारा नवीन जीवन सत्य समजून सांगणारा पुस्तकातील मोकळ्या दोन ओळींतील प्रवास..


सहजच व्हाट्सअप स्टेटस बघत असताना.आमचे मार्गदर्शक मित्र आदरणीय शितल खाडे साहेब व प्रभावी लेखक डॉ.रवींद्र श्रावस्ती यांचे छायाचित्र पाहिले.त्यामध्ये डॉक्टर साहेब खाडे सरांना 'शोध संत रविदास' यांचा ग्रंथ भेट देत आहेत.यासोबतच ग्रंथाचे मलपृष्ठ व मुखपुष्ट यांचा फोटोही पाठवला होता. मी मलपृष्ठ वाचले डॉक्टर व तत्वज्ञान हा विषय मला फारच वेगळा वाटला.मी फोन करुन ग्रंथ मागवून घेतला.लेखकांनीही तो त्वरित पाठवून दिला.


पान उघडले कृतज्ञतेच्या सुगंधकोशी वाचत असताना.

लेखकांचा नम्रपणा,लवचिकता विनयशीलता जाणवली.


जे तुम्ही शोधत असता ते देखील तुमच्या शोधात असते.


बा रविदासा ! शोध चालू आहे.! या प्रकरणांमध्ये या ग्रंथ निर्मिती मागील कळवळा उत्कंठा ध्यास कष्ट समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो ही संवेदनशील उच्च भावना लेखकांच्या मोकळ्या मनाचे दर्शन घडवते.


गुरू रविदास,संत रविदास,संत रैदास,संत रायदास व संत रोहितास ही संत रैदासांचीच नावे आहेत.संत रैदास हे निष्ठूर व्यवस्थेविरुद्ध सभ्य,शालीन शब्दात अभिव्यक्त होतात त्यांच्या या व्यक्त होण्याची तुलना फक्त फुलांच्या कोमलतेशीच करता येईल ! रैदासांनी घाव घातलेत पण रक्त वाहत नाही की जखम होत नाही ! रैदासांच्या विचारांची फुले ही साधीसुधी फुले नाहीत,ती अग्निफुले आहेत ! असे रजनीश ओशो म्हणतात.


रैदास पोकळीतून निर्मान होत नसतात! समाजव्यवस्थेत धग असते,आग असते,अन्याय असतो,अत्याचार असतो,त्यातून विद्रोह भडकून रैदात तयार होतात!


रैदासांची वाणी ही अशी वाणी कि ज्यात धग आहे पण ती आग लावणारी नाही,त्यात आग आहे पण ती प्रकाश देणारी आहे.गारठलेल्या मनाला उब देणारी ती आग आहे.ती आग आणणारी आग आहे! ती समाजमन जागविणारी आग होती! ती सर्जनशील आग होती. नव निर्माण करणारी ती आग होती. आगीचे हे प्रकार वाचून मी थक्क झालो.


चरित्रनायक रैदासांचे चरित्र गायब आहे.तसं ते संत कबीर व इतर संतांच्या बाबतीतही आहे.वैष्णवांचा प्रसिद्ध ग्रंथ 'राम पटल' या ग्रंथात रामानंद संप्रदायातील तेहतीस ( डॉ. सूरजमल यांच्यामते ५२ ) संतांचा उल्लेख केला गेला आहे. त्यात कबीर, पीपा,नामदेव यांच्या नावाचा उल्लेख आहे पण संत रैदासांचा नाही.हेही एक कोडेच आहे. पण त्याच बरोबर हेही आश्चर्यकारक आहे की कबीर,

त्रिलोचन,सधना,सेन,पीपा,पलटूवास,धर्मदाय यांनी कुणीही आपल्या रचनांमध्ये स्वामी रामानंद यांचा गुरु म्हणून निर्देश केलेला नाही


त्यांच्या पत्नीचे नाव लोनी होते.एकुलता एक विजयदास नावाचा पुत्र होता.त्यांच्या मृत्यूचे कोडेच आहे.त्यांच्या अंतिम समयी ते काशी म्हणजे वाराणसीमध्ये राहत होते,असे काही अभ्यासक मांडतात.तर काही अभ्यासक चितोड गडावर त्यांना कपटाने मारले गेले,असे प्रतिपादन करतात.ते १२० वर्षापेक्षा जास्त जगले असेही मानले जाते.


रविदास वाणीचे सर्वात जुने व प्रामाणिक संकलन शिखांच्या 'आदिग्रंथा'त आहे.गुरु अर्जुन देव यांनी इ.स.१६०४ मध्ये 'आदिग्रंथा' चे संकलन केलं.रविदास यांच्या मृत्यूनंतर जवळजवळ शतकाने हे संकलन केले आहे, ही गोष्ट नमूद केली पाहिजे.


आदिग्रंथा' मध्ये त्यांची ३९ पदे व १ साखी यांचा समावेश केला गेला आहे.त्यात एकच पद दोन वेळा किरकोळ फरक करून संकलित केलं आहे.त्यामुळे त्याला धरून ४० पदे व एक साखी त्यात आढळते.


आख्यायिका आणि गुरू रविदास प्रकरणांमध्ये जगभर Mythology म्हणजे दंतकथा, आख्यायिका किंवा पौराणिक कथा यांचा अभ्यास केला जातो.


इंग्रजी वंशशास्त्रज्ञ बी.मिलीनोव्हस्की या मिथक कथा विषय मत मांडताना म्हणतात,'पौरानिक कथा (ही) विचारांचे कोडिकीक्षण करते,नैतिकतेला बळकट करते,वर्तनाचे काही नियम आणि मंजूर विधी प्रस्तावित करते,सामाजिक संस्थांना तर्कसंगत ठरवते आणि न्याय ठरवते.पौरानिक कथा संपूर्ण मानवी इतिहासाला,विचार विश्वाला कवेत घेऊ शकत नाही या संदर्भात खूपच प्रभावी अभ्यासपूर्ण मांडणी केलेली आहे.


हे वाचत असताना मला मनापासून वाटत होते.हा ग्रंथ माझ्यासाठी 'मी जिथे आहे तिथून मला जिथे जायचे आहे तिथे कसे पोचावे हे सांगत आहे.'


एकदा संत रविदास चितोडच्या महाला जवळील एका कच्च्या रस्त्याने जात असताना त्यांना उन्हामुळे भरपूर तहान लागली.तिथेच काही महिला पाणी भरत होत्या.त्या महिलांमध्ये चितोडची कुलवधू राजकुमारी मीरा पण रविदास म्हणाले,'मुली,थोडे पाणी पाज,तुझे कल्याण होईल!'मीराने लगेच त्यांना प्रेमभराने पाणी पाजले आणि त्यांचा परिचय विचारला.संत रविदास यांनी माहिती दिली,'मी काशी चा रहिवासी असून माझे नाव संत रैदास आहे.माझी जात चमार आहे.मीराने पण आपली ओळख करून दिली,म्हणाली,'स्वामीजी मिराबाई! माझ्या जीवनामध्ये दुःख आणि दुःखच आहे.त्यामुळेच माझे जीवन नरकासमान झाले आहे! कृपया मला आपली शिष्या बनवून मला या दुःखातून मुक्त करा,स्वामी!'


संत रविदास यांनी दयापूर्ण अंतकरणाने तिची प्रार्थना ऐकली आणि तिला आपली शिष्या म्हणून स्वीकारले.


(संदर्भ - रविदास - रामायन - लोककथा )


शब्दकोशात 'संत' या शब्दाचा अर्थ साधू,विरक्त, किंवा त्यागीपुरुष असा सर्वसाधारणपणे सांगितला जातो.


सत्याचे आचरण करणारा,आत्मज्ञानी (सत्यज्ञानी) असा अर्थ त्याच्या 'सत' शब्दावरून सांगितला जातो. ईश्वराचे भक्त, धार्मिक पुरुष, विवाह करून ग्रहस्थी सदाचारी जीवन जगणारा असे संत या शब्दाचे आणखी अर्थ सांगितले जातात.


गाथा : ३८१


पामोज्ज बहुलो भिक्खु पसन्नो बुध्द सामने !


अधिगच्छे पदं सन्तं संखारुपासमं सुखं !!


भावार्थ - प्रमोदाने ( आनंदाने ) फुललेला,बुध्द शासनात ( बुद्धांची शिकवण आणि सिद्धांत यांत) प्रसन्न राहणारा भिक्खु संस्काराचा उपशम करणाऱ्या सुखदायी शांत पदाला ( संत पदाला ) पोहोचेल.


वर उद्धृत केलेल्या गाथांचा अभ्यास केल्यानंतर एव्हाना स्पष्ट झाले की संतांचा धर्म चिरकाल टिकणारा,प्रकाशदायी आहे;


संत मिथ्या धारणा नष्ट करून शांती प्राप्त करणारे,काया वाचा व मन याद्वारे तिन्हीत शांती सामावून (शांती प्राप्त करून) लौकिक लाभ,तृष्णा त्यागून मिथ्या धारणा सोडून सुखदायी असे शांत पद (संतत्व) प्राप्त करणारे लोक म्हणजे संत होत.


इथे संत या शब्दाची डॉ.बड़थवाल यांनी प्रतिपादलेली दोन्हीही रुपे दिसतात.ग्रहस्थी धर्मात राहूनही विरक्त,विरागी,निवृत्तीमार्गी आयुष्य जगणारे संत इतिहासात होऊन गेलेत.त्यावर महानुभावांनी सत्यावर विश्वास ठेवला,सत्याचा अनुभव घेतला आणि सत्याचा अनुभव घ्या असे लोकांना परोपरीने सांगितले.तसा आग्रह धरला !


या ठिकाणी एका कथेची आठवण झाली.


एका जपानी कथेनुसार एकदा एका भांडखोर समुराई योध्याने एका झेन गुरूंना आव्हान दिले की, त्यांनी स्वर्ग म्हणजे काय आणि नरक म्हणजे काय, हे स्पष्ट करून द्यावे; पण त्या साधूने त्याला तुच्छतेने उत्तर दिले," तू तर एक आडमुठा रासवट आहेस.

तुझ्यासारख्या माणसाला वेळ देण्याइतका मी रिकामा नाही,झाले ! त्या योद्ध्याच्या प्रतिष्ठेला धक्का बसला,त्याच्या डोक्यात राग भडकला आणि त्याच तिरिमिरीत त्याने आपली तलवार उपसली आणि किंचाळला," तुझ्या या उद्धटपणाबद्दल मी तुला ठार करीन."तेव्हा तो साधू शांतपणे एवढेच म्हणाला, " हा नरक आहे."आपण ज्या संतापाच्या वणव्यात सापडलो होतो त्याकडे गुरु बोट दाखवत आहेत हे सत्य पाहिल्यावर तो योद्धा शांत झाला.आपली तलवार पुन्हा म्यान केली आणि वाकून साधूला नमस्कार केला. त्याने दाखवलेल्या अंतर्ज्ञानाबद्दल त्याचे आभार मानले.आणि हा स्वर्ग आहे," साधू म्हणाला


जे अनावश्यक म्हणून फेकून दिले जाते, त्यातूनही जीवनाचे सत्व शोध महाराज संत साधक असतात.याचा अर्थ जे किरकोळ वाटते, साधे भासते त्यातच सुंदर तत्त्व असते,त्यातच आयुष्य सुंदर बनवण्याचे तंत्र असते!असे जीवनमूल्य शोधणारे संत असतात.


सत्याचा शोध घेणं,सत्याला प्रस्थापित करणे हे संतांचे जीवित ध्येय होते. म्हणून संत सत्याला आपल्या विचारसरणीत महत्त्व देतात सत्याला इतके महत्त्व देतात कि सत्य हाच त्यांचा ईश्वर आहे म्हणून संत रविदास म्हणतात.


सत्य ईश का रुप है सत्य शक्ति अपार !


रविदास सत्य कूं धारणा देई है पाप निवार !!


सत्याला ईश्वराइतचे महत्त्व देणाऱ्या संतांचा प्रवास हा सत्यशोधनाचा प्रवास आहे.पण सत्य म्हणजे स्वानुभवातून प्राप्त होते ते!संत सत्याबाबत असेच मांडतात तेच खरे ज्ञान असे त्यांचे प्रतिपादन असते‌


एका ऐतिहासिक सत्याजवळ येऊन मी थांबलो. करुणा,सेवाभाव,समर्पण भाव ही बौद्ध विचारधारेने या जगाला दिलेली पहिली देणगी आहे नंतर इतरांनी ती उचलली..!


युटोपिया आणि संत रविदास यामध्ये बेगमपूर कविता आहे.दुःख विरहित शहर ही कविता १५ व्या शतकातली आहे पण त्यातला विचार अगदी आजचा आधुनिक असा आहे,डॉ.गेल ऑम्वेट या रचनेचा 'भूतलावरचा युटोपिया'असा गौरव करताना दिसतात.


प्राचीन गण व्यवस्था ही प्रथम स्त्रीसत्ताक होती.कॉ. शरद पाटील यांनी त्यांच्या 'दास शूद्रांची गुलामगिरी' या पुस्तकाचे साधार सिद्ध केले आहे.'राज्ञी' किंवा 'राष्ट्री' हा बहुमान ( किताब ) राज्यकर्त्या स्त्रीला दिला जायचा. या 'राष्ट्री' शब्दातील 'राट्' या शब्दाचा अर्थ 'राज्य करणारी स्त्री' असा आहे.'निघण्टु' या संग्रहाचा हवाला देऊन कॉ.शरद पाटील सिद्ध करतात की राजपदाची उत्पत्ती स्त्रीपासून झाली.भगवान महावीर भगवान बुद्धांनी स्त्रियांना आपल्या धर्मात - धम्मात प्रवेश दिला. ही अभूतपूर्व घटना होती.वैदिक धर्मात काही धर्मवादीनी स्त्रियांची वर्णने आढळतात.पण त्यांना पूर्ण स्वातंत्र्य होते,असे म्हणता येणार नाही. 


गार्गी - याज्ञवल्क यांच्यातील संवाद पुरेसा बोलका आहे. इथून पुढे काही बोललीस तर तुझे शिर धडा वेगळे होईल,असे याज्ञवल्क्य तिला म्हणतो. तुझे शिर धडापासून वेगळे केले जाईल,तोडले जाईल,असाच त्याचा अर्थ होतो. स्त्री स्वतंत्र,चिकित्सक होती,त्याचबरोबर 

स्त्रियांना धमकावले जात होते.हे इथे दिसून येते.


जैन व बौद्ध धर्मात स्त्रियांना उपासिका,भिक्षुनी, - भुक्खुनी होता येत होते.जगातील पहिले स्त्री- वाड्मय म्हणजे या बौद्ध भिक्खूंनीनी लिहिलेल्या 'थेरी - गाथा होत. तसेच शरण व शरणी यांनी 'वचन साहित्य निर्माण केले.१२ शतकात पन्नास वर्षांहूनही कमी कालावधीत उच्च व नीच अशा समाजाच्या सर्व थरातून आलेल्या,स्वतःचा वेगळा 'स्वर' असलेल्या तीनशेहून अधिक कवींना या शरण आंदोलनाने लिहिते केले. इतिहासातील ही अभूतपूर्वच घटना आहे‌. या आंदोलनाने ३३ वचनकार कवयित्री तयार शिक्षणाचा अधिकार नसलेल्या शूद्र, अतिशूद्र व स्त्रिया यांनी जे क्रांतिकारी साहित्य निर्माण केले त्याला इतिहासात तोड नाही.


चेन्नबसवण्णा,सिद्धाराम,सकलेश मादरस,मोळीगेय मारय्या आदी संत अक्कमहादेवी,अक्कनागम्मा,गंगाबिका,

नीलम्मा आदी शरणी संतांनी वचन साहित्य लिहिले.भुक्खुनी कुठेही एकट्या संचार करत असत.स्वतंत्रपणे धम्मप्रचार करत असत. कित्येक भिक्खुनींनी कठीण असे अर्हत पद व निर्वाण प्राप्त केले होते.


संत चळवळीने स्त्रियांना आपल्या वारकरी संघात घेतले.त्यांनाही लिहिण्यास चालना दिली. त्यातूनच मुक्ताबाई, जनाबाई,सोयराबाई,निर्मळा लाडाबाई,लिंबाई या स्त्रिया लिहू लागल्या जनाबाई तर आद्य विद्रोही कवित्री म्हणता येईल अशी कोणतीही भीडभाड न बाळगता लिहिणारी संत आहे.


संत कबीर व संत रोहिदास ज्या काळात जीवन कंठत होते त्या काळात कडवट मुस्लिम सत्ता व कर्मठ हिंदू पातशाही राज्य करत होती. अशा कठीण,स्फोटक काळात कुठल्याही धर्मावर भाष्य करणे म्हणजे स्वतःच्या जीवाशी खेळ करण्यासारखेच होते.एक तर पाशवी कैद किंवा यातनामय देहदंड! दोन्हीही शिक्षा म्हणजे साक्षात मृत्यूच! अशाही परिस्थितीत हे दोन्ही महापुरुष धर्मचिकित्सेचा काटेरी मार्ग तुडवत होते.फरक एवढाच होता,कबीराचा हल्ला तिखट,बेगुमान,आणि धारदार होता तर रैदासांचा शांत,सयंत पण शत्रूच्या गंडस्थळावर नेमका वार करणार होता.त्यासाठी त्यांनी स्वतंत्र संप्रदाय निर्माण केले.चळवळ उभी केली साहित्य निर्माण केले.त्यांचे जे तुटपुंजे साहित्य आज जे उपलब्ध आहे ते सारे लोकांना उद्देशून लिहिलेले आहे ‌ त्यांनी विविध पदे साखी निर्माण केल्या.ते त्यांचे साहित्य म्हणजे विविध विषयांवर केलेली त्यांची भाष्येच आहेत. पवित्र समजलेल्या तीर्थक्षेत्रांना भेटी देण्यापेक्षा हृदयात वसत असलेल्या स्वतःला जाणा असा सल्ला देतात.रैदास इथे जणू श्रद्धांचीच शव परीक्षा अगदी सौम्यपणे पण मार्मिक शब्दात ते मांडतात,भेटी देऊन काय उपयोग? तिथे ईश्वर भेटत नाही. स्वतःच्या मनात ( दिल) स्व:ला शोधा,तिथेच दिलदार मिळेल.

( तिथेच मनाच्या मुक्तीचा मार्ग दिसेल ) खरे तर ती अतिशय मनोज्ञ अशी भावनिक,बौद्धिक - तार्किक आवाहने आहेत.हे सर्व वाचत असताना मी किती अज्ञानी असत्याला सत्य म्हणणारा आहे याची तीव्र जाणीव झाली.


योग याग म्हणजे भक्ती नव्हे,घरदार सोडून जाणे ( कुल कानि गोलाई),आहार कमी करणे ( उपास-तापास), वैरागी होऊन फिरणे,वेद - शास्त्रे यांची वारेमाप स्तुती - फुशारकी मारत फिरणे, मुंडन करणे आदी बाह्याचार करणे म्हणजे भक्ती करणे नव्हे,असे बजावून रैदासांनी स्पष्ट शब्दात खोट्या भक्तीला नाकारले आहे.


यासंदर्भात एक छान वाक्य आहे-'भगति न कथै ज्ञान' याचा सरळ साधा अर्थ 'भक्ति ज्ञान देत नाही'.वरील प्रकारच्या तथाकथित भक्तीमुळे ज्ञान वाढत नाही.भक्ती ज्ञान सांगत नाही.भक्ती केल्याने ज्ञानाची निर्मिती किंवा प्राप्ती होत नाही. हे त्यांचे वाक्य म्हणजे बॉंब गोळच आहे.भक्ती ज्ञानाचे प्रतीक होऊ शकत नाही हा या वाक्याचा गर्भितार्थ आहे.


विचारांच्या,बुद्धीच्या,जाणिवेच्या घनदाट जंगलामध्ये वाचकाला फक्त पुस्तक सोबत घेऊन प्रवास करावा लागतो. पण हा सत्य सांगणारा वैचारिक संवेदनशील भावनिक गुंतागुंत असणारा हा ग्रंथ वाचत असताना मी या जंगलामध्ये एकटा नव्हतो तर स्वतः लेखक माझ्या सोबत होते अशा भावनेने माझे मन उचंबळून येत होते.


सिद्धार्थ पूर्वीची यात्रा हरमान हेसे या पुस्तकात खूप छान जीवनतत्व सांगितलेलं आहे.गोविंद व सिद्धार्थ यांच्यातील हा संवाद आहे.गोविंद बुद्धाला शरण गेला आहे.व ते त्यांचे शिष्य आहेत.तर सिद्धार्थ स्वानुभवातून शिकत आहे शिकलेला आहे.


सगळ्या गोष्टींचा प्रतिकार न करता जगावर प्रेम करता यावं,कुठल्यातरी कल्पनारचित,

मनोवांछित,परिपूर्ण सृष्टीशी या जगाची तुलना करण्याचा मोह न व्हावा आहे,तसंच ते ठेवून आणि काही काळ आपण त्याचे रहिवासी झालो याचा आनंद मानीत त्याला अखेरचा मुजरा करीत प्रेमानं त्याचा निरोप घ्यावा.


सिद्धार्थने जमिनीवरचा एक दगड उचलून घेतला.तो हाताळत त्यांन म्हटलं,'हा दगड आहे,कालावधीत त्याचं मातीत रूपांतर होईल त्या मातीतून तो कदाचित वनस्पतीचं,पशुच वा मानवाचं रुप घेईल.

यापूर्वी मी म्हटलं असतं:हा नुसता दगड आहे,तो कवडी किमतीचा आहे.माया जगताचा घटक आहे.परिवर्तनाच्या चक्रात फेरे घेतो तोही कदाचित मनुष्य होईल,चित् स्वरूप होईल,म्हणून दगडही महत्त्वाचा आहे.


पण आता मी असा विचार करतो : 


हा दगड आहे,त्याचवेळी तो प्राणी आहे,ईश्वर आहे.आज ती एक वस्तू आहे आणि उद्या ती वेगळेच काही होणार आहे म्हणून तिच्याकडे प्रेमादरानं मी पाहतो असं नव्हे,तर आधीपासून ती सर्व काही आहे आणि निरंतर ती सर्वच काही असणार आहे. या दृष्टीने मी तिच्याकडे पाहतो.

तो दगड आहे आणि या क्षणी मला दगडाच्या रूपात दिसत आहे एवढंच माझ्या प्रीतीला पुरेसं आहे.त्यावरच्या खाणाखुणा,खाचा आणि खवले,त्याचा पिवळसर करडा रंग,त्याचं काठिन्य,आपटला असता त्यातून निघणाऱा ध्वनी,त्याच्या पाठीवरचा कोरडेपणा अगर ओलावा या सर्वासर्वांत मला मूल्य आणि अर्थ दिसतो.कित्येक दगडी असे असतात की,त्यांचा स्पर्श तेलासारखा किंवा साबणासारखा लागतो. कित्येक पानांसारखे रेषाळा किंवा वाळूसारखे रवाळ दिसतात.प्रत्येक भिन्न असतो.आणि त्याच वेळी आपल्या रीतीनं दगड असतो,याचाच मला मोठा आनंद होतो होतो अपूर्व नवलाईचा आणि पूजनीय वाटतो.!


हा ग्रंथ वाचनाचा प्रवास म्हणजे स्वतःसाठी स्वतःहून केलेला प्रवास.


सत्य हाच ईश्वर - 'सत्य ईश का रुप'


निर्गुण परंपरेचा पाया सत्यावर आधारित होता.'सत्य विद्या को पडो. सदा प्राप्त करो ज्ञान'असे जे रैदास म्हणतात,त्याला भरपूर महत्त्व आहे. ज्ञान घेतानासुद्धा सत्यावर आधारित,सत्याचे अधिष्ठान असलेले ज्ञान घ्या असे कसे बजावतात.असत्य,गोटे असे कोणतेही संस्कार ते टाळायला सांगतात.


सत्याला ईश्वराच्या ठिकाणी प्रतिष्ठित करणे म्हणजे त्याद्वारे ईश्वराची प्रतिष्ठा वाढविणे नव्हे ! सत्य हे महान मानवी मूल्य आहे! उलट ईश्वराला सत्याच्या ठिकाणे मानने, प्रतिष्ठित करणे म्हणजे ईश्वराची प्रतिष्ठा वाढविण्यासारखेच आहे. म्हणूनच निर्गुण परंपरा सत्यालाच ईश्वर मानते आणि सत्यात अपार शक्ती आहे असे ठामपणे सांगतात.


सत्याच्या आश्रयाने जगा,सारे जग जर एका बाजूला झाले,जगाने साथ जरी सोडली तरी सत्याच्या जगणे सोडू नका,असा मौलिक सल्ला रैदास देतात.खरंच किती उच्च जीवनातील तात्विक सत्याची खोली वाढणारं जीवन तत्व संत जगत असतात.या ग्रंथामध्ये सर्वांगीन जीवनाचे धर्माची सत्याची परिभाषा समजावून सांगितली आहे.यामधील संतांना,या ग्रंथाच्या भेटी मधून मला लवचिकता नम्रता शिकायला मिळाली.ते या ग्रंथाचे लेखक डॉ.रवींद्र श्रावस्ती यांच्यामुळे,ग्रथांच्या मलपृष्ठावरील शब्दरूपी आरसा मनस्वीपणाने डोळ्यापुढे धरून ग्रंथाबाबत उच्चकोटीचे भाष्य करणारे डॉ. सूर्यनारायण रणसुभे,व नाग - नालंदा प्रकाशन या सर्वांचे मनःपूर्वक आभार जीवनातील सत्य समजावून सांगण्यासाठी यांनी केलेले अपार कष्ट, हे म्हणजे धाडसी पाऊलच सर्वांना विनम्र धन्यवाद..


बुद्धाने तर दुःख विमुक्तीचा महामार्ग दिला. जीवनाला जसं आहे तसं जाणा,त्याला सामोरे जा.दुःखाचे कारण शोधा म्हणजे त्यातच त्याचा उपायही सापडेल,असे सांगून ते थांबले नाहीत तर दुःख मुक्तीसाठी त्यांनी नवा मार्ग दाखविला,प्रज्ञा, शील आणि समाधी याद्वारे दुःख मुक्ती शक्य आहे,असे दाखवून दिले. 


सृष्टीच्या घटकांविषयी ज्ञान आणि त्यातून आलेला व्यापक दृष्टिकोन ही प्रज्ञा आहे. चांगल्या उपजिविकेसाठी कोणते कर्म केले पाहिजेत,कोणते टाळले पाहिजेत;

आपली उपजीविका करताना दुसऱ्याला दुःख,वेदना,इजा होणार नाही हे पाहणे हेच शील आहे.प्रज्ञापूर्ण आणि शीलमय आयुष्य जगण्यासाठी चांगले प्रयत्न करत राहणे:जागृती,विवेकी जगने आवश्यक असते.हे सर्व जगत असताना आपण हे असेच करत आहोत ना? दुष्कर्म आपल्या हातून घडत नाही ना?आपल्याकडून कुशल कर्मेच होत आहेत ना,हे सारं पुन्हा पुन्हा बघणं अत्यावश्यक असते.सगळ्यात शेवटची पायरी म्हणजे सम्यक समाधी,समाधी म्हणजे फक्त ध्यानधारणा नव्हे.समाधीचा अर्थ जागृती असाही होतो.सम्यक समाधी म्हणजे व्यक्तीने समाजाशी आनंदाने समन्वित व तल्लीन होणे.हे सर्व समजून घेण्यासाठी आणि ते सर्व आपल्या व्यक्तिमत्वात एकरूप होण्यासाठी म्हणून तर संत रैदास 'निरंजन ध्यावो' चा सल्ला देतात. ध्यान लावून बसणे म्हणजे निष्क्रियता नव्हे. आपण जे कार्य हाती घेतले आहे त्या कार्याप्रती सदैव एकनिष्ठ राहता यावे,स्वत:ला बाहेरील अनावश्यक दबावापासून ताणापासून मुक्त राहता यावे म्हणून ध्यान,समाधी आवश्यक असते.स्वतःला कार्यप्रवण,निर्भय,दोषरहित बनविण्यासाठी साधक ध्यानाची विशिष्ट तंत्र आत्मसात करतात.'निरंजन'अवस्था प्राप्त 'निरंजन' ही स्थिती किंवा अवस्था काय आणि माया (मन) यावर नियंत्रण करुन,शून्यतेचा बोध होऊन शक्य होते.हेच निरंजन अवस्था प्राप्त करण्याचे मर्म.रैदास म्हणतात.'कह रैदास मरम जू पाऊ,देव निरंजन सतकरि ध्याऊ!


या ग्रंथामध्ये अनेक अज्ञात असणाऱ्या,असत्य सत्य म्हणून सांगणाऱ्या,परंपरा ह्या सगळ्याच गोष्टींबाबतचे सत्य क्रांतिकारकपणे मांडले आहे. 


यासंदर्भात बरेच साहित्य नष्ट झालेले आहे. (केलेले आहे) यातील सिद्धांत,पुरावा,संदर्भ खरोखरच अलौकिक अभ्यासपूर्ण व जीवणाला एक नवीन दृष्टिकोन देण्यासारखे आहे. प्रत्येक मनुष्याने आपल्या स्वत:साठी हा ग्रंथ एकदा नक्कीच वाचावा.हा ग्रंथ आपल्या सोबत असणे म्हणजे इतिहास आपल्या जवळ आहे. 


असे वाटते,कबीर,गोरखनाथ,सुफी पंथ, बुध्द धम्म,महानुभाव पंथ,संत नामदेव,संत तुकाराम सर्व संतांची धर्माची,संतांची अभ्यासपूर्ण मांडणी यामध्ये आहे.


संत साहित्यात गीता,भागवत पुराण व योगसूत्रे यांचा उल्लेख आढळतो.भगवद्गीता हा ग्रंथ महाभारताचा एक भाग आहे. त्यात पिंपळमहात्म्य,वेदविरोध,अर्हताचेगुण,

अहिंसा,यज्ञविरोध इत्यादी बौद्ध धर्माच्या वैचारिक विश्वातील गोष्टी आढळतात.जर्मन विद्वान गार्ब त्यांनी गीतेचा काळ इ.स.२०० मांनला आहे.अनेक विद्वानांनी महाभारत आणि पर्यायाने भगवद्गीता ही बुध्दोत्तर आहे असे मांडले आहे.


एक भिक्खु भिक्षा मागून जगण्यासाठी,तगून राहण्यासाठी त्याला ९० समर्थक घरे असावी लागतात. रोज तीन घरे याप्रमाणे भिक्षा मागून एक भिक्खु तीस दिवस गुजराणकरू शकत असे.नव्या परिस्थितीत लोक घाबरून उघडपणे भिक्षा देईनासे झाले त्यामुळे अशा भिक्खूंना गृहस्थी जीवण जगावे लागले परंतु त्यांनी धम्मप्रचार,

धम्मदेशना सोडली नाही,तर नव्या रूपात बौद्ध धम्माला ते मांडत राहिले.


सुफी संतांची परंपरा प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या उदयापूर्वीपासूनची परंपरा आहे,असे ओशोसहीत अनेक विद्वानांचे मत आहे, त्याचे कारण सुफींचे विचार व आचारसंहिता इस्लाम धर्मातील प्रथा-परंपरा यापेक्षा काही बाबतीत भिन्न आहे. पण तरीही सुफी परंपरा इस्लामचा भाग आहेच. प्रेम,भक्ती,क्षमाशीलता सहिष्णुता,ज्ञानाचा प्रसार व प्रचार यांना महत्त्व दिले आहेच.


ज्या ठिकाणी मी नम्र,नतमस्तक झालो तो प्रसंग या ठिकाणी लिहुन मी थांबतो.


संत कबीर व संत रैदास यांचे एक संयुक्त चित्र बादशहा* शहाजहान यांचा थोरला पुत्र ' दारा शुकोह ' यांनी

तयार करून घेतले होते. ते त्यांनी आपल्या पिताश्रींच्या दरबारी चित्रकारांकडून म्हणजे फकीर उल्ला यांच्याकडून सन १६४० मध्ये करवून घेतले होते. सध्या हे पेंटिंग दिल्लीतील नॅशनल म्युझियममध्ये ठेवले आहे.दारा शुकोह यांचे त्यासाठी आपण ऋणी असले पाहिजे. कारण त्यांच्यामुळे हा ठेवा आज उपलब्ध राहू शकला.दारा शुकोह हा सुफी तत्त्वज्ञ होता. तो फक्त राजपुत्र नव्हत;तर कवी,बहुभाषा कोविद,ग्रंथकार,अनुवादक होता. सुरुवातीच्या काळात तो सुफी चळवळीतल्या चिश्ती पंथाचा अनुयायी होता. नंतर तो कादरी पंथाच्या प्रभावात आला व त्याने या पंथाचे अनुयायीत्व पत्करले.त्याची सुफी संतांशी घनिष्ठ मैत्री होती. त्याचबरोबर त्यांची हिंदू धर्मातून पुढे आलेल्या संतांशी देखील चांगले सख्य होते. तो या दोन्ही धर्माचा समन्वयवादी म्हणूनही ओळखला जातो.


जाता .... जाता...


हा ग्रंथ वाचत असताना स्वतःमध्ये बदलाचा स्वानुभव मी घेत होतो. चिंतन करत होतो, मनन करत होतो,समजून घेत होतो.गंभीरपणे विचार करत होतो स्वतःला समजून घेणं,'जाग्यावर असणं म्हणजे काय?' या प्रश्नाचे उत्तर मला नक्कीच मिळाले.


तुमच्या आशा कधीही सोडू नका.एकच पान जंगलाची सुरुवात असू शकते… 


या विचाराची प्रगल्भता दाखवणारा हा ग्रंथ ..

एकवेळ अवश्य वाचून आपल्या संग्रही जतन करून ठेवावा असा आहे.

३/२/२३

भारताच्या प्राचीन कला- १

जगाच्या पाठीवर कुठलीही संस्कृती जर टिकून रहायची असेल तर ती परिपूर्ण असणे आवश्यक आहे.परिपूर्ण याचा अर्थ,त्या संस्कृतीनं सर्वांगानं मानवी मनाचा विचार करायला हवा. समाजमनाचा विचार करायला हवा.आणि या कसोट्यांवर आपली भारतीय संस्कृती पुरेपूर उतरते.म्हणूनच फाळणी- नंतर पाकिस्तानचा राष्ट्रकवी झालेल्या इकबालने म्हटलं होतं


यूनान,मिस्र,रोमा,सब मिट गये जहाँ से ... ! 

कुछ बात हैं की हस्ती मिटती नहीं हमारी..!!


ही 'हस्ती' म्हणजे आपली परिपूर्ण जीवनपद्धती. जगण्याच्या सर्वच आघाड्यांवर आपण पुढे होतो. फार, फार पुढे होतो.... जाता जाता एक लहानसं उदाहरण देतो -


सन १९९४ मधे मी सर्वप्रथम अमेरिकेला गेलो. त्यापूर्वी जपान आणि युरोप बऱ्यापैकी फिरलो असल्याने अमेरिकेचं तसं फार कौतुक नव्हतं. पण तरीही अमेरिकेतल्या अनेक गोष्टी अंगावर येतच होत्या.माझी तिथली व्यवस्था बघणारा माणूस सुदैवानं भारतीय होता.बंगाली बाबू. त्यामुळे तो मला अमेरिकेतलं प्रत्येक अप्रूप दाखवत होता.तो मला 'ड्राईव्ह-इन'ची गंमत दाखवायला लागला- की,बघ,अमेरिकेत कसं सर्वदूर ड्राईव्ह-इनची सोय असते.मेक डोनाल्डमधे गाडीत बसल्या बसल्याच पैसे द्यायचे आणि गाडीत बसल्या बसल्याच आपलं खाण्याचं पॅकेटही घ्यायचं.ड्राईव्ह-इन एटीएम सुद्धा त्याने दाखवले.


मी थोडा फार तरी नक्कीच इम्प्रेस झालो होतो.

पुढे पाच / सहा वर्षांनी रायगडावर गेलो. त्या विस्तीर्ण पसरलेल्या होळीच्या माळावर ते पुरुषभर उंचीचे,एका रांगेत बसवलेले चबुतरे बघितले अन् त्या गाईडला विचारलं, 'हे काय रे बाबा..? असे उंच चबुतरे कशाला?' अगदी सहज स्वरात तो गाईड म्हणतो,"हा बाजार आहे. अहो,त्या काळी घोडेस्वार बाजार-हाट करायला आले की घोडे कुठं ठेवतील ? म्हणून


घोड्यावर बसूनच बाजार-हाट करायची सोय महाराजांनी केली होती.... खरं सांगतो,अंगावर सर्रकन काटा उभा राहिला..! कोण मॉडर्न ?


साडेतीनशे वर्षांपूर्वी आपल्या रयतेसाठी, सैनिकांसाठी 'ड्राईव्ह-इन' बाजाराचे निर्माण करणारा आमचा शिवाजी राजा मॉडर्न,की गेल्या पन्नास- साठ वर्षांत ड्राईव्ह-इनची कसरत केलेले हे अमेरिकन्स मॉडर्न ?


पण हे फार पुढचं उदाहरण झालं.आपण भारतीय पूर्वीपासूनच पुढारलेले होतो.आपल्या समग्र जीवनशैलीसह आपण पुढारलेले होतो. ज्ञान-विज्ञानाच्या आणि अध्यात्माच्या बरोबरच आपल्या देशात कला,संगीत हे विषय निर्माण झाले,प्रगत झाले अन् पुढे कालांतराने प्रगल्भ झाले. कलेला एक निश्चित स्वरूप देण्याचं काम भारतानं केलंय.


अगदी आपली गायन/ वादन परंपराच घेऊ.ही खूप प्राचीन आहे.देवी सरस्वती ही प्राचीन देवता मानली जाते.तिच्या हातात वीणा दिसते.नवव्या शतकात शृंगेरीत बांधलेलं शारदाम्बा देवीचं मंदिर म्हणजेच सरस्वतीचं.गदगचं सरस्वतीचं प्राचीन मंदिर हे अकराव्या शतकात बांधलंय.पण सरस्वतीच्या मूर्ती त्याहून आधीच्या आढळतात. सरस्वतीची सर्वांत प्राचीन आढळलेली मूर्ती ही भारहून येथे सापडली आहे,जी पहिल्या शतकातली आहे.काही नृत्य-शारदाही दिसतात. पण अधिकांश मूर्ती ह्या वीणा घेतलेल्या

आहेत.म्हणजे वीणा हे वाद्य किती जुनं ? तर काही हजार वर्षं तरी नक्कीच..! म्हणजे बघा, संगीताचे उल्लेख आपल्याकडे प्राचीन काळापासून आढळतात !


सरस्वतीनं धारण केलेलं 'वीणा' हे तंतुवाद्य किमान चार हजार वर्षं तरी जुनं असावं असा अंदाज आहे. पूर्वी ही 'एकतंत्री वीणा' असायची. भरतमुनीने 'आपल्या' नाट्यशास्त्रात' 'चित्रा' (७ तारांची ) आणि 'विपंची' (९ तारांची )


ह्या प्रमुख वीणांचा उल्लेख केलेला असून घोषा, कच्छभी अशा दुय्यम वीणा सांगितल्या आहेत.


पण संगीताचे उल्लेख आपल्या वेदकाळापासून बघायला मिळतात.ऋग्वेदाला प्राचीनतम मानलं जातं,जो पाच हजार वर्षं जुना आहे.ऋग्वेदात संगीताचे उल्लेख येतात.यजुर्वेदाच्या ३० व्या कांडात १९ आणि २० व्या मंत्रांत अनेक वाद्य वाजवण्याचा उल्लेख येतो.अर्थात त्या काळात वाद्य वाजविणे' ही कला असावी.वाण,वीणा, कर्करीया तंतुवाद्यांबरोबरच अवनद्ध 'वीणा' - हे प्राचीन वाघ् वाद्यात दुंदुभी,गर्गरा तर सुषिर वाद्यात बाकुर,नाडी,तुणव,शंख यांचे उल्लेख येतात.


मात्र 'सामवेदात' संगीताचे विस्ताराने वर्णन मिळते. त्या काळात स्वरांना 'यम' म्हटले जायचे. सामवेदातल्या 'साम' चा संगीताशी घनिष्ठ संबंध होता. इतका की, 'छांदोग्योपनिषद' मध्ये प्रश्न विचारलाय,


कां साम्नो गतीरिती ? स्वर इति होवाच अर्थात 'साम' ची गती काय आहे ? उत्तर आहे स्वर.


वैदिक काळात तीन स्वरांच्या गायनाला 'साम्रिक' (आजच 'सामूहिक' ?) म्हणायचे. हे स्वर होते - ग,रे.स.पुढे हे सप्तसूर झाले. स्वरांचा क्रमांक . ठरवून जो समूह निर्माण झाला त्याला 'साम' म्हणायला लागले. पुढे युरोपमधे त्यांच्या संगीतातील अशा क्रमाला 'स्केल' हे नाव मिळाले.


याचाच अर्थ आपल्याकडे किमान तीन ते चार हजार वर्षांपूर्वी विकसित झालेले संगीत नांदत होते.पुढे भरतमुनींचे नाट्यशास्त्र आपल्याला मिळाले.अन् भारतीय संगीताच्या प्राचीनत्वावर शिक्कामोर्तब झाले.


ह्या भरत मुनींचा कालखंड इसवी सनापूर्वी साधारण पाचशे वर्षं मानला जातो.पण त्याबद्दल काहीसा विवाद आहे.कोणी त्यांचा जन्म इसवी सनापूर्वी शंभर वर्षं झाला असंही म्हणतात. ते काही असलं तरी भरत मुनींच्या नाट्यशास्त्राने एक मोठी गोष्ट केली.


भारतीय कला ह्या विकसित स्वरूपात,अगदी 'वैज्ञानिक रीत्या' अस्तित्वात होत्या हे निश्चितपणे सिद्ध झालं.


या ग्रंथात नाट्यशास्त्राबरोबरच इतर सपोर्टिव्ह कलांचीही व्यवस्थित माहिती दिलेली आहे. गीत-संगीतासंबंधी विस्तृत वर्णन यात आढळते.


जगातलं सर्वांत जुनं संगीत कोणतं? किंवा सर्वांत जुनं वाद्य कोणतं? असं म्हणतात की, इसवी सनापूर्वी ४००० वर्षे मिस्रच्या लोकांनी बासरीसारखी काही वाद्यं निर्माण केली. डेन्मार्कमधे इसवी सनापूर्वी २५०० वर्षे ट्रम्पेटसारखं वाद्य निर्माण केलं गेलं.


मात्र पाश्चात्त्य जगाला सुरांच्या विशिष्ट श्रेणीत बसवलं ते पायथागोरसने.म्हणजे इसवी सनापूर्वी ६०० वर्षे.त्याने स्वरांचे मंडल तयार केले आणि त्याला गणितीय परिभाषेत बसवले.


दुर्दैवाने भारतात जुनी कागदपत्रे आणि इतर अवशेष मुसलमानांच्या आक्रमणात नष्ट झाली, त्यामुळे आपला नक्की इतिहास सांगता येत नाही.पण इसवी सनापूर्वी अडीच हजार वर्षांच्या नोंदी सापडतात आणि त्यानुसार संगीताचा किंवा वाद्यांचा नवीन शोध लागला आहे असं वाटत नाही.एखाद्या विकसित कलेला शब्दबद्ध केल्यासारख्या त्या नोंदी आहेत.


मात्र ऋग्वेद आणि सामवेदातील उल्लेख बघता आपले संगीत हे किमान ५ हजार वर्षे तरी नक्कीच जुने असावे. आणि गंमत म्हणजे सामवेदातील सूत्रांमधे एक विकसित आणि प्रगल्भ संगीतव्यवस्था उलगडत जाते.


वेदांबरोबरच अनेक उपनिषदांतूनही गीत-संगीत आणि इतर कलांचा उल्लेख मिळतो. श्रोतसूत्रांपैकी कात्यायनाचे श्रोतसूत्र आहे. मुळात हा वैदिक कर्मकांडासंबंधीचा ग्रंथ आहे. मात्र यातही उत्सवप्रसंगी गायल्या जाणाऱ्या गीत-संगीताची रेलचेल आहे.या श्रोतसूत्राचा कालखंड साधारण तीन हजार वर्षांपूर्वीचा मानला जातो.


पाश्चात्त्य संगीताचा विचार करता एक गंमत जाणवते.पाश्चात्त्य संगीतात दोन हजार / अडीच हजार / तीन हजार वर्षांपूर्वीचे उल्लेख ठामपणे केलेले आढळतात.मात्र त्या उल्लेखात नवीन काही शोधून काढण्याचं स्पष्टपणे मांडण्यात आलेलं आहे.


उलट भारतीय ग्रंथांमधे जी वर्णनं आढळतात ती एखाद्या विकसित संगीत पद्धतीची माहिती देतात.अगदी सामवेदाच्या सूत्रांतही विकसित झालेल्या संगीताचे उल्लेख आहेत.याचाच अर्थ भारतीय संगीत अगदी शास्त्रशुद्धपणे कितीतरी आधी विकसित झालेलं आहे. किती आधी ? सांगणं कठीण आहे..!


एक दुर्दैव असंही की,भारतीय कलांच्या इतिहासाबद्दल जे संदर्भ येतात ते अधिकांश पाश्चात्त्य संशोधकांचेच असतात.ब्रॉडीज, इ. वुईनडिश, व्ही. स्मिथ, पिशेल, याकोबी, हार्मन कीट.... वगैरेसारख्यांचाच बोलबाला आहे.. त्यामुळे भारतीय संगीताच्या इतिहासाला एका उपेक्षित नजरेनंच पाह्यलं गेलंय.


जसं गीत-संगीत, तसंच नाटकाचंही. भारतासारखंच विकसित नाट्यशास्त्र सर्वांगानं बहरलं ते ग्रीसमधे.मात्र एकोणिसाव्या शतकात ह्यावरून वाद उसळला की भारतीयांनी ग्रीसच्या रंगभूमीवरून सर्व कल्पना उचलल्या,ग्रीसची रंगभूमी भारतीय नाट्यशास्त्रानं प्रभावित झाली होती..! यात नक्की काय घडलं.. ? की

ते पुढील प्रकरणात बघुया.. !!


१ फेब्रुवारी २०२३ या लेखातील पुढील भाग..