* विजय गायकवाड | Vijay Gaikawad: दिनांक ३० डिसेंबर १९३० रोजी इंग्लंड वरून डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांनी रमाई यांना लिहिलेले पत्र आजही काळजाला पिळून टाकतं•

live

नमस्कार आपले स्वागत आहे. मी पुस्तके आणि मित्रांवर पैसे खर्च करतो,माझ्याकडे दगड आणि विटांवर खर्च करण्यासाठी पैसे नाहीत.- रस्किन बाँड.ही थोर माणसं व त्यांचे विचार मला पुस्तकात भेटलीत.ती भेटली आणि त्यांनी सांगितले कि, प्रत्येक दिवशी असं काही तरी करा की,ते तुम्हाला अधिक सुंदर उद्याच्या दिशेने खूप लांबवर घेऊन जाईल."- डोग फायरबाऊ.' सर्वियन कादंबरीकार मिलोराद पावीच यांचे एक वाक्य आहे ते म्हणतात - जोवर जगात पुस्तक वाचणाऱ्या वाचकांची संख्या बंदूकधारी सैनिका पेक्षा अधिक आहे तोवर काळजीच काहीच कारण नाही.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात.पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये.म्हणून अविरतपणे प्रयत्न करणारे मार्गदर्शक, मित्र धावून येतात.प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,डॉ.दीपक शेटे,आ.भरत बुटाले,प्रा.सर्जेराव राऊत,सुभाष ढगे,अनिल फारणे,डॉ.सुधीर सरवदे ,विश्वास खाडे, विनायक पाटील,संजय कुंभार,सतीश खाडे,मनोहर सुर्वे,गणेश खंदारे,तात्या गाडेकर, दादासाहेब गाडेकर, दादासाहेब ताजणे, पुस्तकातील घटना प्रसंग सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील यांनी केलेले आहे. मला लिहिण्याची प्रेरणा देणारी पुस्तके,लेखक,प्रकाशक,मित्र ही जगावेगळी माणसं माझ्या जीवनातील महत्वाचा टप्पा आहेत.... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ.मेघा गायकवाड, चिरंजीव मयान,माझ्या धावण्यातील गुरुवर्य नामदेव बरुरे,लुल्ला शेख मोठी ताई ,लहान ताई जयश्री शिंदे या सर्वांचेच मनापासून आभार व धन्यवाद मॅट्रिक फेल विजय गायकवाड

७/२/२३

दिनांक ३० डिसेंबर १९३० रोजी इंग्लंड वरून डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांनी रमाई यांना लिहिलेले पत्र आजही काळजाला पिळून टाकतं•

रमा !

कशी आहेस रमा तू? तुझी, यशवंताची आज मला खूप आठवण आली. तुमच्या आठवणीनं मन खूपच हळवं झालं आहे आज मागल्या काही दिवसातली माझी भाषणे फारच गाजली. परिषदेतील सर्वोत्कृष्ट भाषणे,प्रभावी वक्तृत्वाचा सर्वोत्कृष्ट नमुना असे माझ्या भाषणांबद्दल इकडच्या वर्तमानपत्रांमधून लिहून आले आहे. या पहिल्या गोलमेज परिषदेतील माझ्या भूमिकेचा विचार मी करीत होतो.आणि डोळयापुढे आपल्या देशातील सर्व पीडितांचे संसार माझ्या डोळयासमोर उभे राहिले.


दुःखांच्या डोंगराखाली ही माणसे हजारो वर्षे गाडली गेली आहेत.या गाडलेपणाला पर्याय नाही हीच त्यांची समजूत आहे.मी हैराण होतो आहे रमा ! पण मी झुंज देतो आहे.माझी बौध्दिक शक्ती परमवीर झाली होती जणू ! खूप भावना मनात दाटून आल्या आहेत.खूपच हळवे झाले आहे मन खूपच व्याकूळ झाले आहे मन! आणि घरातल्या तुम्हा सर्वांची आठवण आली. तुझी आठवण आली.यशवंताची आठवण आली.


मला तू बोटीवर पोचवायला आली होतीस.मी नको म्हणत होतो तरी तुझे मन तुला धरवले नाही.तू मला पोचवायला आली होतीस. मी गोलमेज परिषदेला जात होतो.माझा सर्वत्र जयजयकार सुरु होता.तू पाहत होतीस.तुझं मन गदगदून आलं होतं.कृतार्थतेनं तू ओथंबून आली होतीस.तू शब्दांनी बोलत नव्हतीस;पण तुझे डोळे जे शब्दांना सांगता येत नसते तेही सांगत होते.तुझं मौन शब्दाहून अधिक बोलकं झालं होतं.तुझ्या गळयातील आवंढा तुझ्या ओठापर्यंत येऊन थडकत होता.ओठातील शब्दांच्या भाषेपेक्षा डोळयातील आसवांचीच भाषा त्यावेळी तुझ्या मदतीला धावली होती.


आणि आता इथे लंडनमध्ये या साऱ्याच गोष्टी मनात उभ्या राहिल्या आहेत.मन नाजूक झाले आहे.जीवात कालवाकालव होत आहे.कशी आहेस रमा तू ! आपला यशवंत कसा आहे? माझी आठवण काढतो तो? त्याचे संधीवाताचे दुखणे कसे आहे? त्याला जप रमा ! आपली चार मुलं आपल्याला सोडून गेलीत.आता आहे फक्त यशवंत.तोच तुझ्या मातृत्त्वाचा आधार आहे आता.त्याला आपण जपलं पाहिजे.यशवंताची काळजी घे रमा ! यशवंताला खूप अभ्यास करायला लाव.त्याला रात्री अभ्यासाला उठवीत जा. माझे बाबा मला अभ्यासासाठी रात्री उठवीत.तोवर ते जागे राहत.मला ती शिस्तच त्यांनी लावली.मी उठलो,अभ्यास सुरु केला की ते झोपत असत.अगदी प्रारंभी मला रात्री अभ्यासाला उठण्याचा कंटाळा येई.त्यावेळी अभ्यासापेक्षा झोप महत्त्वाची वाटे.पुढे तर आयुष्यभरासाठी झोपेपेक्षा अभ्यासच मोलाचा वाटत राहिला.याचं सर्वात जास्त श्रेय माझ्या बाबांना आहे.माझ्या अभ्यासाची वात तेवत राहावी म्हणून माझे बाबा तेलासारखे जळत राहत.त्यांनी रात्रीचा दिवस केला.अंधाराचा उजेड केला.माझ्या बाबांच्या कष्टांना आता फळे आली.फार फार आनंद वाटतो रमा आज रमा यशवंताच्या मनाला असाच अभ्यासाचा छंद लागला पाहिजे.ग्रंथाचा त्याने ध्यास घेतला पाहिजे.


रमा,वैभव,श्रीमंती या गोष्टी निरर्थक आहेत.तू अवतीभोवती पाहते आहेसच.माणसं अशाच गोष्टींच्या सारखी मागे लागलेली असतात.त्यांची जीवनं जिथून सुरु होतात तिथच थांबलेली असतात. 


या लोकांची आयुष्ये जागा बदलीत नाहीत.आपल्याला असं जगून चालायचं नाही रमा.आपल्याजवळ दुःखांशिवाय दुसरं काहीच नाही.दारिद्रय,गरिबी यांच्याशिवाय आपल्याला सोबत नाही.अडचणी आणि संकटे आपल्याला सोडीत नाहीत.अपमान,छळ,अवहेलना या गोष्टी आपल्याला सावलीसारख्या जखडलेल्या आहेत.


मागे अंधारच आहे.दुःखाचे समुद्रच आहेत. आपला सूर्योदय आपणच झाले पाहिजे रमा. आपणच आपला मार्ग झाले पाहिजे.त्या मार्गावर दिव्यांची ओळ आपणच झाले पाहिजे. त्या मार्गावर जिद्दीचा प्रवास आपणच झाले पाहिजे.


आपणाला दुनिया नाही.आपली दुनिया आपणच निर्माण केली पाहिजे.आपण असे आहोत रमा. म्हणून म्हणतो यशवंताला खूप अभ्यास करायला लाव.त्याच्या कपडयांची काळजी घे.त्याची समजूत घाल.त्याच्यात जिद्द जागव.मला तुझी सारखी आठवण येते.यशवंताची आठवण येते.


मला कळत नाही असं नाही रमा,मला कळतं की तू दुःखांच्या या वणव्यात स्वतः करपून जात आहेस.पाने गळत जावीत आणि जीव सुकत जावा त्याप्रमाणे तू होते आहेस.पण रमा मी तरी काय करु ! एका बाजूने हात धुवून पाठीशी लागलेले दारिद्रय.दुसऱ्या बाजूने माझ्या जिद्दीने घेतलेला वसा.वसा ज्ञानाचा !


मी ज्ञानाचा सागर उपसतो आहे.मला इतर कशाचे यावेळी भान नाही;पण ही शक्ती मला मिळवण्यात तुझाही वाटा आहे.तू इथे माझा संसार शिवत बसली आहेस.आसवांचे पाणी घालून माझे मनोबल वाढवीत आहेस.म्हणून मी बेभान मनानं ज्ञानाच्या तळगर्भाचा वेध घेतो आहे.


खरं सांगू रमा,मी निर्दय नाही.पण जिद्दीचे पंख पसरून आकाशात उडणाऱ्या मला कोणी सादही घातली,तरी यातना होतात.माझ्या मनाला खरचटतं आणि माझ्या रागाचा भडका उडतो. मलाही हृदय आहे रमा ! मी कळवळतो. पण मी बांधलो गेलो आहे क्रांतीशी ! म्हणून मला माझ्या स्वतःच्या भावना चितेवर चढवाव्या लागतात. त्याच्या तुला,यशवंतालाही कधी झळा पोचतात. हे खरं आहे;पण यावेळी रमा मी हे उजव्या हाताने लिहितो आहे आणि डाव्या हाताने अनावर झालेली आसवे पुसतो आहे.सुडक्याला सांभाळ रमा.त्याला मारु नको.मी त्याला असे मारले होते.त्याची आठवणही कधी त्याला करुन देऊ नको.तोच आता तुझ्या काळजाचा एकुलता एक घड आहे.


माणसांच्या धार्मिक गुलामगिरीचा,आर्थिक आणि सामाजिक उच्चनीचतेचा आणि मानसिक गुलामगिरीचा पत्ता मला शोधायचा आहे. माणसाच्या जीवनात या गोष्टी ठाण मांडून बसलेल्या आहेत.त्यांना पार जाळून-पुरुन टाकता आला पाहिजे. समाजाच्या स्मरणातून आणि संस्कारातूनही या गोष्टी नाहीशा झाल्या पाहिजेत.


रमा ! तू हे वाचते आहेस आणि तुझ्या डोळयात आसवं आली आहेत.कंठ दाटला आहे. तुझं काळीज थरथरायला लागलं आहे.ओठ कापू लागले आहेत. मनात उभे राहिलेले शब्द ओठापर्यंत चालतही येऊ शकत नाहीत. इतकी तू व्याकूळ झाली आहेस.


रमा, तू माझ्या आयुष्यात आली नसतीस तर? तू मनःसाथी म्हणून मिळाली नसतीस तर? तर काय झालं असतं? केवळ संसारसुखाला ध्येय समजणारी स्त्री मला सोडून गेली असती. अर्धपोटी राहणे, गोवऱ्या वेचायला जाणे वा शेण वेचून त्याच्या गोवऱ्या थापणे किंवा गोवऱ्या थापायच्या कामावर जाणे कोणाला आवडेल? स्वयंपाकासाठी इंधन गोळा करायला जाणे, मुंबईत कोण पसंत करील.घराला ठिगळे लावणे, वस्त्रांना शिवत राहणे,एवढयाच काडयाच्या पेटीत महिना निभला पाहिजे,एवढेच धान्य, एवढेच तेलमीठ पुरले पाहिजे.हे माझ्या मुखातून बाहेर पडलेले गरिबीचे आदेश तुला गोड वाटले नसते तर? तर माझे मन फाटून गेले असते. माझ्या जिद्दीला तडे गेले असते. मला भरती येत गेली असती आणि तिला त्या त्या वेळी लगेच ओहोटीही लागली असती.माझ्या स्वप्नांचा खेळच पार विस्कटून गेला असता रमा ! माझ्या जीवनाचा सगळा सूरच बेसूर झाला असता, सगळीच मोडतोड झाली असती. सगळाच मनःस्ताप झाला असता.मी कदाचित खुरटी वनस्पतीच झालो असतो.जप स्वतःला जशी जपतेस मला.लवकरच यायला निघेन काळजी करु नकोस.


सर्वांस कुशल सांग.

कळावे,

तुझा

भीमराव

लंडनD⅓⁷


आमचे मार्गदर्शक परमित्र दादाराव ताजने यांनी व्हॉट्सऍप वर पाठविलेले पत्र..