* विजय गायकवाड | Vijay Gaikawad

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

४/४/२४

पाहूणचार करा मनापासून / Be kind and considerate..

उमेशने फोन ठेवला तशी त्याची बायको उल्का लगबगीने त्याच्याजवळ आली.


"कुणाचा फोन होता?तुम्ही कुणाला या या म्हणत होतात?"तिने काळजीयुक्त उत्सुकतेने विचारलं


"अगं काही नाही.दादाचा फोन होता.पुढच्या आठवड्यात येतोय आपल्याकडे"

"एकटेच ना?"


"नाही.सगळ्या कुटुंबासह येतोय.चार दिवस लागोपाठ तहसील आँफिसला सुटी आहे म्हणेे.स्वतःची एक दिवस सुटी घेऊन पाच दिवस आपल्याकडे रहाणार आहे."


" आणि तुम्ही त्यांना हो म्हंटलंत?"


"हो.का?तीन वर्षांनी येतोय तो आपल्याकडे.मग नाही कसं म्हणायचं?"


उल्काने कपाळावर हात मारुन घेतला.


"अहो तुम्हांला समजत कसं नाही?"तिच्या बोलण्यात आता संताप आणि उद्विग्नता दिसत होती "अहो मागच्याच महिन्यात आपण माझ्या मावसबहिणीच्या लग्नाकरीता आठवडाभर सुटी घेतली होती.आणि पुढच्या महिन्यात माझा चुलतभाऊ अमेरिकेहून येतोय.

त्याच्यासाठी आठवडाभर सुटी लागणार आहे.आता मला सांगा या महिन्यात आपल्या दोघांनाही कशी सुटी मिळेल?" उमेशचा चेहरा उतरला.ही गोष्ट त्याच्या लक्षातच नव्हती आली."अगं पण उल्का आपण त्यांच्याकडे हक्काने जायचं,सातआठ दिवस मनसोक्त रहायचं,मजा करायची आणि आता ते यायचं म्हणताहेत तर कोणत्या तोंडाने नाही म्हणणार?शेवटी विलासदादा माझा मोठा भाऊ आहे.आपण जातो तेव्हा तो सुटी घेतोच ना?"


"अहो ती काय खेड्यातली माणसं!त्यांना कसली आली आहेत कामं?रिकामटेकडी नुसती!आणि विलासदादांचं मला काही सांगू नका.चांगली गव्हर्नमेंटची नोकरी आहे त्यांची! भरपूर सुट्या मिळतात त्यांना.

आपल्यासारखा थोडीच आहे प्रायव्हेट जाँब!एक सुटी घ्यायची मारामार.तिथे पाच दिवस सुट्या मिळणार तरी कशा?" तिचा हा मुद्दा मात्र बरोबर होता.उमेश हो तर म्हणून बसला होता पण त्यालाही सुटीसाठी बाँसच्या विनवण्या कराव्या लागणार होत्या.त्यातून विलासदादा येणार त्याच दिवसात काही फाँरेन डेलीगेट्स येणार होते.म्हणजे सुटी मिळण्याची शक्यता जवळजवळ नव्हतीच.उल्का तणतणत किचनमध्ये निघून गेली.तिथेही तिची बडबड सुरुच होती.उमेशला आठवलं गेली कित्येक वर्ष तो कुटूंबासह दरवर्षी दिवाळी आणि उन्हाळ्याच्या सुट्यात त्याच्या गावी चोपड्याला जायचा.चोपडा हे जळगांव जिल्ह्यातलं तालुक्याचं गांंव.तसं बऱ्यापैकी शहर पण पुण्याची सर त्याला कशी येणार?पण तरीही सगळ्यांना तिथे जायला आवडायचं.याचं कारण म्हणजे विलासदादा आणि सरीतावहिनींचं आदरातिथ्य.ते  त्यांना कधीही काही कमी पडू देत नसत.सरीतावहिनी ग्रुहिणीच होती पण नायब तहसीलदार असलेला विलासदादा खास त्यांच्यासाठी सुटी घ्यायचा.ते रात्री बेरात्री केव्हाही येवोत विलासदादा आपली कार घेऊन ६० किमी.अंतरावरच्या जळगांवला त्यांना घ्यायला यायचा.तसंच परततांना सोडायला यायचा.घरी आल्यापासून खाण्यापिण्याची चंगळ असायची.हाताला विलक्षण चव असलेली सरीता

वहिनी रोज खान्देशी पदार्थांबरोबरच भारतातले वेगवेगळे पदार्थ करुन त्यांना खाऊ घालायची.एंजाँयमेंटचे रोज वेगवेगळे प्लँन्स बनायचे.शेतात फिरणं,कधी जळगांव, धुळ्याला चक्कर मारणं तर कधी जवळपासच्या टुरीस्ट प्लेसेसना भेट देणं अशा गोष्टींची चंगळ असायची.त्या आठवड्यात दादा,वहिनी त्यांचा इतका भरभरुन पाहुणचार करायचे की शेवटच्या दिवशी निघतांना सगळ्यांचे पाय जड व्हायचे.उमेशची मुलं तर रडायचीच.

विलासदादाकडे आलं आणि निघतांना कपडेलत्ते आणि महागड्या गिफ्ट्स मिळाल्या नाहीत.असं कधीही व्हायचं नाही.अर्थातच विलासदादाकडचे ते चारपाच दिवस प्रचंड आनंदाचे आणि सुखाचे असायचे.


उमेशला ते सगळं आठवलं आणि तो मनातून स्वतःवरच नाराज झाला.विलासदादा आणि सरीतावहिनी जेवढं चोपड्याला आपण गेल्यावर आपल्यासाठी करतात त्याच्या निम्मं तरी आपल्याला जमेल का या विचाराने तो धास्तावला.खरं तर तो पुण्याला आल्यापासून विलासदादा फारच कमी वेळा त्याच्या घरी आला होता.आला तरी चारपाच तासांच्यावर त्याच्याकडे थांबला नव्हता.

कुटूंबासह चारपाच  दिवसासाठी येण्याची त्याची ही पहिलीच वेळ होती.त्यामुळे त्याचा पाहूणचार चांगलाच व्हायला पाहिजे होता.पण उल्का अशी तोंड फुगवून बसली तर काही खरं नव्हतं.


दोन दिवसांनी त्याने उल्काला विचारलं

"मग काय ठरवलंस तू?"

"कशाबद्दल विचारताय तुम्ही?"उल्काने कपाळावर आठ्या पाडत विचारलं.

" तेच गं.दादा आल्यावर सुटी घ्यायचं?"

"तुम्हीच घ्या सुटी.तुमचे भाऊ आणि वहिनी आहेत ते" "का?तुझे ते कोणीच नाहीत का?"

त्याने संतापाने विघारलं "बरं ठिक आहे मी सुटी घेईन.पण सकाळच्या स्वयंपाकाला तर तुच पाहिजेस ना?नाही म्हणजे मला येतो स्वयंपाक पण वहिनींसमोर मी स्वयंपाक करणं बरं दिसेल का?शिवाय त्याच पिरीएडमध्ये जर्मनीचं शिष्टमंडळ आपल्या कंपनीला भेट देतंय.माझ्या जमदग्नी बाँसला विचारणंही मुश्कील आहे"

"मी पण तर त्याच कंपनीच्या मेन आँफिसला काम करते ना?मग मला कशी मिळेल सुटी? आणि हे बघा या गोष्टीवरुन आता वाद नकोत.तुमच्या भावापेक्षा माझा दहा वर्षांनी अमेरिकेहून येणारा भाऊ जास्त महत्वाचा आहे."


" मग काय मी माझ्या भावाला हाकलून देऊ?" उमेशचा पारा आता चांगलाच चढला होता."काही हाकलायची गरज नाही.दिवसभर असेही ते पुणं पहायला बाहेर असतील.संध्याकाळी आपण असूच की त्यांचा पाहुणचार करायला!शिवाय आपली मुलं असतीलच त्यांच्यासोबत"हा मुद्दा उमेशला पटला.पण त्याचं समाधान  काही झालं नाही.सहकुटूंब तीन वर्षांनी त्याच्याकडे येणाऱ्या भावाला असं एकटं घरी सोडून जाणं त्याच्या पचनी पडत नव्हतं.पण त्याचाही नाईलाज होता.शहरातले प्राँब्लेम्स् दादावहिनीला काय माहीत असणार!शिवाय दादा वहिनी समजून घेतील असंही त्याला वाटलं.सोमवारी संध्याकाळी विलासदादाने त्याला महाराष्ट्र एक्स्प्रेसने बसल्याचं आणि सकाळी साडेचारला पुण्याला पोहचणार असल्याचं कळवलं." तू ओला किंवा टँक्सी करुन घरी ये" असं उमेश त्याला म्हंटला खरा पण साठ किमी.अंतरावरुन त्याला घ्यायला येणारा दादा त्याला आठवला." आपल्याकडे फोर व्हिलर असती तर गेलो असतो घ्यायला."असं त्याने स्वतःचं समाधान करुन घेतलं.

अर्थात फोर व्हिलर असती तरी भल्या पहाटे झोपेतून उठून तो जाणं शक्यच नव्हतं हे त्यालाही कळत होतं.


दुसऱ्या दिवशी सकाळी पाच वाजताच घराची बेल वाजली.उमेश अनिच्छेनेच उठला तर उल्काच्या मनात विचार आला "या लोकांना पुण्याला यायला हीच गाडी मिळाली होती का?असं दुसऱ्यांच्या झोपा मोडणं यांना शोभतं का?शेवटी खेड्यातलेच ना!यांना मँनर्स कुठून येणार?" उमेशने दार उघडून त्यांना आत घेतलं.

" दादा झोप झाली नसेल तर झोपा थोडं" विलासदादाकडे पहात उमेश म्हणाला.भाऊजी अहो पाच वाजलेत.आमची रोजची उठायची हीच वेळ आहे.त्यामुळे आता झोप येणं शक्यच नाही.आणि गाडीत झाली चांगली झोप आमची "सरीतावहिनी म्हणाली.तिचा आवाज ऐकून बेडरुममध्ये झोपलेली उल्का पाहुण्यांना मनातल्या मनात शिव्या देत उठली.हाँलमध्ये येऊन तिने सगळ्यांचं खोटंखोटं का होईना स्वागत केलं.सकाळी आठ वाजता उमेश आणि उल्का दोघंही आँफिसला जायची तयारी करु लागले.ते पाहून विलासदादा आश्चर्याने म्हणाला " हे काय ?आँफिसला निघालात की काय?का सुटी नाही घेतली?" साँरी दादा.सुटीचा अर्ज दिला होता पण ती मंजूर नाही झाली.कंपनीत फाँरेनचे डेलीगेट्स व्हिजीटला येताहेत.त्यामुळे सुटी मिळणं कठीणच होतं.प्लीज जरा समजून घे ना!अरे पण मग उल्काला तर सुटी घ्यायला सांगायचं.नाही ना दादा मलाही सुटी नाही मिळाली" उल्का बाहेर येत म्हणाली. विलासदादाने सरीता

वहिनीकडे पाहिलं.तिच्या चेहऱ्यावर नाराजी स्पष्ट जाणवत होती.


" अगं मग आम्हांला तसं सांगायचं ना !नसतो आलो आम्ही.तुम्ही दोघंही नसतांना आम्ही घरात थांबणं बरं तरी दिसतं का?" सरितावहिनी नाराजीने म्हणाली.


असं कसं म्हणता वहिनी?तुम्ही इतक्या वर्षांनी येणार आणि आम्ही नाही म्हणायचं?अहो असंही तुम्ही दिवसा कुठेतरी बाहेरच साईटसाईंगला जाणार.संध्याकाळी आम्ही आहोतच ना!आज मला वाटतं तुम्ही सिंहगडावर जाऊन यावं.तिथंलं पिठलंभाकरी खाण्यात खुप मजा येते.संध्याकाळी तुम्ही येण्याच्या आत आम्ही येऊ.मग करता येईल पाहुणचार" उमेश मखलाशी करत म्हणाला.

दादा आणि वहिनीने एकमेकांकडे पाहिलं.पण दोघंही काही बोलले नाहीत.


" तसं आम्ही आज परत एकदा साहेबांना भेटून  सुटीचं विचारतोच आहे"उल्का पर्स गळ्यात टांगत म्हणाली "चला करा एंजाँय.भेटू संध्याकाळी बरं दादा भेटतो संध्याकाळी"

उमेशनेही हात हलवत दादाचा निरोप घेतला.ती दोघं गेल्यावर सरीता विलासकडे पहात म्हणाली."बघितलंत कसे आहेत तुमचे भाऊ? आपल्यालाकडे येतात तेव्हा आपण त्यांच्याकरीता काय नाही करत?साधी आपली दुपारच्या जेवणाचीसुध्दा व्यवस्था केली नाही त्यांनी.सिंहगडावर जेवा म्हणे.आपल्याला कसचं आलंय त्या पिठलं भाकरीचं कौतुक?आणि किती वेळा जाणार त्या सिंहगडावर?त्यांना असं वाटतं जसं आपण पुणं पाहिलेलंच नाहिये."


तेवढ्यात उमेशची मुलं बाहेर आली म्हणून सरीता चुप झाली.विलासलाही त्यांचं हे वागणं पटलं नव्हतं.कुठून इथे आलो असं त्याला होऊन गेलं.


संध्याकाळी उमेश आणि उल्का घरी परतले तेव्हा विलास आणि सरीता घरीच होते."अरे!गेला नाहीत सिंहगडावर?" उमेशने विलासच्या मुलांना विचारलं.काका आम्ही दोनदा बघितलाय सिंहगड.बोअर होतं आम्हांला परत परत तेच बघायला. आम्ही केळकर म्युझियमला जाऊन आलो."

" बाबा आज खुप मजा आली" उमेशचा मुलगा मध्येच म्हणाला "काकूंनी आज खुप छान स्वयंपाक केला होता.

इतके जेवलो आम्ही की बस!" काकू छानच करतात स्वयंपाक"उल्का सरीताकडे पहात म्हणाली.मग थोडा वेळ थांबून म्हणाली "वहिनी तुमच्या हातची ती खान्देशी शेवभाजी मला खुप आवडते.प्लीज कराल आज?" हो हो शेवभाजी!मलाही खुप आवडते.कराल वहिनी?"उमेशने विचारलं "ठिक आहे करते" सरीता म्हणाली खरं पण उल्का चोपड्याला येते तेव्हा एकाही कामाला हात लावत नाही हे तिला आठवलं.इथे मात्र ती हक्काने तिच्याकडून कामं करुन घेत होती.


" बरं मला सांग तुला सुटी मिळाली की नाही?" विलासने सरीताच्या चेहऱ्यावरची नाराजी पहात उमेशला विचारलं.

नाही ना दादा.माझा इमिजिएट बाँस तर नाहीच म्हणतोय आणि मोठे साहेब आज आँफिसला नव्हते.उद्या परत विचारतो. उल्काला तरी मिळाली का सुटी?नसेल मिळत तर सरळ विदाऊट पे करायला सांग.असं किती दिवस आम्ही एकटंच घरात बसायचं?"


" हो रे दादा मला कळतंय ते!पण काय करणार आमच्या कंपनीत विदाऊट पे केली तर नोटीस देऊन सरळ काढून टाकतात.शिवाय बोनस वगैरेवरही परीणाम होतो.

भाऊजी,आपली इमेजही खराब होते.प्रमोशनवरही परीणाम होतो" उल्का म्हणाली.विलासदादा काही बोलला नाही.मात्र यांना सुटीचं जमत नव्हतं तर आपल्याला सरळ नकार दिला असता.असं आपल्याला घरात बसवून ठेवण्यात काय फायदा?" हा नैसर्गिक विचार त्याच्याही मनात डोकावून गेला.


दुसऱ्या दिवशीही दिर-जावेच्या जेवणाची कुठलीही व्यवस्था न करता उल्का आणि उमेश निघून गेले.मात्र जातांना "वहिनी तुम्हांला स्वयंपाक करायचा कंटाळा आला असेल तर "झोमँटो" वरुन जेवण पाठवून देवू का?" एवढं तिने विचारलं.हाँटेलचं काहीही न आवडणारी सरीता हो थोडीच म्हणणार होती?


दुपारी पाच वाजता शिपाई निरोप घेऊन आला.उमेशला मोठ्या साहेबांनी बोलावलं होतं.उमेशची छाती धडधडू लागली.जमदग्नी बाँस काय बोलेल याचा नेम नव्हता.

" सर मला तुम्ही बोलावलंत?"उमेशने त्यांच्या केबिनमध्ये प्रवेश करतांना घाबरत घाबरत विचारल." मिस्टर थोरात तुम्ही सुटीचा अँपलिकेशन दिला होता?मी शिर्केंनाही विचारलं.ते तर म्हणाले की तुम्ही अर्ज तर सोडाच तोंडीसुध्दा विचारलेलं नाही."नाही सर.मी सुटी मागितली नव्हती.उमेश गोंधळून उत्तरला मग तुम्ही तुमच्या भावाला सुटी मिळत नाही असं का सांगितलं?"


उमेशच्या अंगावर तर जणू वीजच कोसळली.अवाक् होऊन तो साहेबाकडे पहातच राहिला.ही गोष्ट साहेबांपर्यंत कशी पोहचली हे त्याच्या लक्षात येईना." बोला मिस्टर थोरात.सुटी न मागता तुम्ही सुटी मिळत नाही असं तुमच्या भावाला का सांगितलं?" साहेबांनी दरडावून विचारुन विचारलं.उमेशच्या अंगातून घामाच्या धारा वाहू लागल्या."स..र..स..र म..ला वाटलं ते जर्मनीचे लोक आले होते तर मला कुणी सुटी देणार नाही.असा परस्पर अंदाज तुम्ही कसा काय लावलात?अगोदर अर्ज दिला असता.तो रिजेक्ट झाला असता तर तुम्ही तसं म्हणू शकला असता.याचा अर्थ असा की तुम्हांला सुटी घ्यायचीच नव्हती.घरी आलेलं भावाचं कुटुंब कसं लवकर निघून जाईल याचीच तुम्ही वाट पहात होतात.हो ना?"


" नाही सर.सर तसं नाही.मी ...मी..."

" काहो तुम्ही पुण्यात रहाता म्हणजे तुम्ही स्वतःला खुप माँडर्न,स्मार्ट,हुशार आणि चोपड्यात रहाणारा तुमचा भाऊ,वहिनींना गावंढळ,रिकामटेकडे,मागासलेले समजता का?"


"नाही सर तसं.."


"तुम्ही चोपड्याला गेलात की त्यांनी तुम्हांला घ्यायला यावं.सातआठ दिवस तुमच्या दिमतीला रहावं.तुम्ही म्हणाल ते खाऊ पिऊ घालावं,तुमची सरबराई करावी,तुम्हांला कपडेलत्ते करावे.आणि तुमच्याकडे ते येतात तेव्हा तुम्ही साधी सुटी घेऊन घरी राहू नये?मान्य आहे की तुमचं लाईफ फास्ट आहे आणि त्यांचं लाईफ शांत आहे.याचा अर्थ असा नाही की ते टाकावू आहेत,रिकामटेकडे आहेत.उलट त्याचं आयुष्य सुखासमाधानाचं आहे.आपल्यापेक्षा त्यांची घरं मोठी आहेत,सगळ्या सुखसुविधा आहेत.या मोठ्या घरांसारखीच त्यांची मनंही मोठी आहेत.त्या फ्लँटनामक खुराड्यात राहून आपली मनंही खुराड्यासारखीच छोटी,संकुचित झालीयेत.अहो तुमच्या भावाला तुमच्यापेक्षा दुप्पट पगार आहे.

मिळणारा मानही तुमच्यापेक्षा जास्त आहे.मनात आणलं असतं तर दोन नंबरच्या मार्गाने त्यांनी करोडोची कमाई केली असती आणि तुमच्या

सारख्याला घरगडी म्हणून ठेवलं असतं.पण ते इमानदार आहेत.त्यांनी पैसा नाही नाव कमावलंय.

साहेब संतापून बोलत होते.


पण सर तुम्हांला हे कसं कळलं आणि तुम्ही विलासदादाला कसं ओळखता?"साहेब हसले.

"मिस्टर थोरात तुमचे भाऊ माझे मित्र आहेत."

उमेशला परत एक मोठा धक्का बसला.

" आता ते माझे मित्र कसे तेही सांगतो.मीही चोपडा तालुक्यातलाच.पण गेली कित्येक वर्ष पुण्याला स्थायिक झालोय.तीन वर्षापूर्वी आमच्या शेतीच्या कामासाठी मी तहसील कार्यालयात गेलो होतो.तीन लाख कबुल करुनही आमचं काम होत नव्हतं.कुणीतरी तुमच्या भावाचं इमानदार अधिकारी म्हणून नाव सुचवलं.आम्ही त्यांना जाऊन भेटलो.अडचण सांगितली.दोन वर्षांपासून होत नसलेलं काम तीन दिवसात झालं तेही एक पैसा खर्च न करता.चर्चा करतांना साहजिकच तुमची ओळख निघाली.आपल्या भावाचे बाँस म्हणून तुमचे भाऊ आम्हांला तुमच्या घरी जेवायला घेवून गेले.आमचा आदरसत्कार केला.तेव्हापासून आम्ही मित्र आहोत.

दर महिन्याला आमचं फोनवर बोलणं होत असतं. माझी काही मदत लागली तर सांगा.असं मी त्यांना एकदा म्हंटल्यावर त्यांनी माझ्या वहिनीसाठी तुमच्या कंपनीत नोकरी असेल तर बघा."अशी विनंती केली.

त्यांच्या सांगण्यावरुनच आम्ही तुमच्या मिसेसला आपल्या कंपनीत लावून घेतलंय." हे ऐकल्यावर उमेशला आणखी एक मोठा धक्का बसला.त्याचबरोबर उल्काचं दादावहिनींसोबतचं वागणं आठवलं.आणि शरमेनं त्याची मान खाली गेली.


आज सकाळीच त्यांचा फोन आला.भावाची सुटी मंजूर करा अशी त्यांनी मला विनंती केली.तेव्हा मला हे कळलं.


सर दादाने तुमच्या मैत्रीबद्दल आणि त्यांच्या ओळखीमुळे मिसेसला नोकरी मिळाली आहे.याबद्दल मला कधीही काही सांगितलं नाही.मी म्हंटलं ना ही माणसं विशाल ह्रदयाची असतात.अशी उपकाराची जाणीव ते करुन देत नाहीत.शिवाय तुम्ही या ओळखीचा गैरफायदा घ्याल असंही त्यांना वाटलं असेल.उमेश मान खाली घालून उभा राहिला.काय बोलावं तेच त्याला सुचेनासं झालं.सर मग काय करायचं सुटीचं?"जरा वेळाने उमेशने घाबरत विचारलं.काय करायचं म्हणजे?तुमची सुटी मंजूर झालीये सोमवारपर्यंतची.तुम्ही अर्ज ठेवून जा.पण सर दादा रविवारपर्यंतच रहाणार आहे.साहेब हसले.नाही मिस्टर थोरात.रविवारी मी त्यांना माझ्या घरी सहकुटुंब पाहुणचाराला बोलावलंय.इतका चांगला माणूस माझ्याकडे पाहूणा म्हणून येतोय याचा मलाच खुप आनंद होतोय.खरं तर त्यांना सुटी नाही नाहीतर मीच त्यांना दोनतीन दिवस माझ्याकडे ठेवून घेतलं असतं.आणि आता तुमच्याही हातात तीन दिवस आहेत.तुम्हीही तुमच्या भावाला छान पाहुणचार करा.त्यांना कशाचीही कमतरता भासू देऊ नका.पैसे हवे असतील तर माझ्याकडून घ्या.पण काहीही कमी पडू देऊ नका.असं समजा की तुम्ही चोपड्याला रहाताय आणि ते तुमच्याकडे पुण्याहून आले आहेत म्हणजे तुमची मानसिकता बदलेल.


" साँरी सर आमच्याकडून चुक झाली.पुन्हा असं होऊ देऊ नका.नाहीतर माझ्याशी गाठ आहे.ओके या तुम्ही थँक्स सर " 


तो जाण्यासाठी वळला तसे साहेब म्हणाले एक मिनिट.तुमच्या मिसेसचीही सुटी मंजूर करायला सांगितलंय.त्यांनाही सोबत घेऊन जा रिक्षातून एकत्र परतताना उल्का उमेशला रागाने म्हणाली.अजब जबरदस्ती करतात साहेब.मी मागितलेली नसतांनाही मला सुटी दिली.आता घालवा तीन दिवस त्या रिकामटेकड्या माणसांसोबतउल्का तोंड सांभाळून बोल आणि त्यांच्याशी नीट वाग.ही नोकरीही तुला दादामुळेच मिळालीये आणि मनात आलं तर तो तुला कधीही नोकरीतून बाहेर करु शकतो?"

"काय्यsss!काही काय सांगताय?"

मग उमेशने तिला सगळी कहाणी सांगितली.


घरी परतल्यावर उल्का सरीताला म्हणाली.वहिनी मी चांगली भांडून सुटी घेतलीये बरं का!आणि आता तुम्ही कोणतंच काम करायचं नाही.असं समजा तुमच्या लहान बहिणीकडे तुम्ही आला आहात.आता तीन दिवस मी तुम्हांला चांगला पाहुणचार करणार आहे.


उमेशने विलासदादाकडे पाहिलं.तो त्याच्याचकडे बघून गालातल्या गालातल्या हसत होता.मी तुझ्या साहेबांना फोन केला त्याचं तुला वाईट तर नाही ना वाटलं?" 

"नाही दादा.उलट आमचे डोळे उघडले साहेबांनी.साँरी दादा आम्ही असं वागायला नको होतं.मला माफ कर विलासदादाने त्याच्या पाठीवर थोपटलं इट्स ओके उमेश.झालं गेलं विसरुन जा.आजकाल घरोघरी हेच चालतं.मोठ्या शहरातली माणसं गावाकडच्या लोकांना नेहमीच कमी दर्जाची,रिकामटेकडी समजतात.हा तुमचा दोष नाही.हा तुम्ही रहाता त्या शहराचा गुणधर्मच आहे.

चल जाऊ दे.आता तीन दिवस आम्हांला एंजाँय करु दे"


(ही गोष्ट दीपक तांबोळी यांच्या "अशी माणसं अशा गोष्टी " या पुस्तकातील आहे.) 

२/४/२४

अखेरचे आवाहन…Last call... (2)

३१.०३.२४ या लेखातील पुढील शेवटचा भाग..


आपल्या जगापुढील एक दुसरे अरिष्ट म्हणजे युद्धाचे.

अलीकडच्या घडामोडीवरून आपल्याला स्पष्ट कळून आले आहे की,राष्ट्र मोठ्या प्रमाणावरील विध्वंसाच्या शस्रांचे साठे कमी करीत नसून उलट वाढवीत आहेत.

जगातील अत्यंत विकसित राष्ट्रांतील सर्वात बुद्धिमान माणसांनी आज लष्करी तंत्रशास्त्राला वाहून घेतले आहे.आण्विक अस्त्रांच्या चाचण्यावर बंदी घालण्याचा मर्यादित करार होऊनही आण्विक अस्त्रांचा प्रसार थांबलेला नाही. 


उलट अलीकडेच पहिल्या गौरेतर,पौर्वात्य आणि कमी विकसित राष्ट्राने कम्युनिस्ट-चीनने-अणुस्फोट केला आहे.

त्यामुळे साऱ्या मानवजातीसमोर अणुयुद्धाचा भयंकर धोका अमर्याद प्रमाणावर उभा आहे.आतापर्यंत माणसांनी आण्विक युद्धाचे स्वरूप व धोके या संबंधीच्या वास्तव परिस्थितीला आपल्या मनात थारा दिला नाही;कारण त्यांना ती कल्पनाच मुळी अतिशय मानसिक यातना देणारी व न मानवणारी होती.पण त्यामुळे अशा युद्धाचे स्वरूप बदलत नाही किंवा धोके टळत नाहीत.केवळ त्या विचाराला थारा न दिल्यामुळे चिंता तात्पुरती दूर होत असेल पण त्यामुळे मानसिक शांतता व भावनात्मक सुरक्षितता लाभत नाही.आजही माणसाला युद्धाचे आकर्षण वाटते,ही सत्यस्थिती आहे.पण अनुभवावरून आपणास हे कळून आले पाहिजे की,युद्धाची कल्पना आजकाल विसंगत ठरली आहे.एके काळी अनिष्ट प्रवृत्तीचा फैलाव व वाढ यांना आळा घालण्याच्या दृष्टीने युद्ध उपयुक्त ठरत असेल पण आधुनिक काळातील शस्त्रांची विध्वंसक शक्ती इतकी मोठी आहे की,त्यामुळे अनिष्ट प्रवृत्तीला पायबंद घालण्याचे साधन या दृष्टीनेही युद्धाची उपयुक्तता नाहीशी झाली आहे.


सायरनांचे मधुर गीत


जीवन हे जगण्यालायक आहे आणि माणसाला जगण्याचा हक्क आहे हे आपल्याला मान्य असेल तर आपण युद्धाला दुसरा पर्याय शोधून काढलाच पाहिजे.

अवकाशयाने बाह्य अवकाशात भराऱ्या मारत असताना आणि विध्वंसनाची भयंकर क्षेपणास्त्रे वातावरणातून मृत्यूसाठी हमरस्ते तयार करत असताना कोणताही देश युद्धात आपण विजय मिळवू याची खात्री देऊ शकणार नाही.मर्यादित प्रमाणात युद्ध झाले तरी मानवी

हालअपेष्टा, राजकीय अशांतता व आध्यात्मिक भ्रमनिरास यांचा अनर्थकारक वारसा,परंपरा शिल्लक राहते.पण जागतिक महायुद्ध झाले तर परमेश्वराच्या कृपेने असे महायुद्ध न होवो - माणसाने आपल्या चुकीने अखेर आपला नाश ओढवून घेतला याची मुग्ध आठवण म्हणून फक्त धुमसणारी राख शिल्लक राहील.आधुनिक काळातील माणसे जर युद्धाची खुमखुमी बाळगतील तर या पृथ्वीचा डान्टेच्या कल्पनेतही आला नसेल एवढा भयंकर नरक करतील.म्हणून आपणा सर्वांना आणि माझे भाषण ऐकणाऱ्या व हे भाषण वाचणाऱ्या सर्वांना माझी एक सूचना आहे:अहिंसेचे तत्त्वज्ञान व कृती यांचा ताबडतोब अभ्यास केला जावा आणि मानवी संघर्षाच्या सर्व क्षेत्रात, इतकेच काय पण राष्ट्रांराष्ट्रांतील संबंधांच्याही क्षेत्रात अहिंसेच्या अख्खाचे गंभीर प्रयोग केले जावेत,अखेर राष्ट्रच युद्ध करतात,राष्ट्रांनीच मानवजातीच्या अस्तित्वाला धोका आणणारी शस्त्रास्त्रे तयार केली आहेत.केवळ विध्वंसकच नव्हे तर ती आत्मघातक आहेत."


त्याचबरोबर आपल्याला काही प्राचीन सवयींच्या,

उदाहरणार्थ अफाट सत्तेच्या व्यवस्थेवर विचार करावयाचा आहे आणि अवर्णनीय गुंतागुंतीचे प्रश्न सोडवायचे आहेत. यावेळी आपणापुढे दोन पर्याय आहेत.एक म्हणजे मानतावादाचा पूर्ण त्याग करून,जी शस्त्रास्त्रे आपणच निर्माण केली आहेत,त्यांची धास्ती घेऊन निष्क्रिय होणे किवा वांशिक अन्यायाप्रमाणेच राष्ट्राराष्ट्रांतील युद्ध व हिंसा यांना तातडीने आळा घालणे.गौरकाय लोक व निग्रो यांच्यातील समानता म्हणजे दहशतीखाली वावरणाऱ्या आणि विनाशाकडे चाललेल्या जगातील समानता ठरणार असेल तर त्यामुळे गौरकाय लोक अगर निग्रो यांपैकी कोणाचेच प्रश्न सुटणार नाहीत.निःशस्त्रीकरण व शांतता साध्य करण्याकरिता ज्या समस्या सोडवाव्या लागतील त्यांचे गुंतागुंतींचे स्वरूप मी क्षुल्लक लेखू इच्छित नाही.

पण मला वाटते,या क्षेत्रात आपण मानसिक व आध्यात्मिक फेरमूल्यमापन करण्याची तयारी दाखविल्याशिवाय या समस्या सोडवण्यासाठी आवश्यक अशी इच्छाशक्ती,धैर्य व दूरदृष्टी आपण व्यक्त करू शकणार नाही. आपण आपला दृष्टिकोन बदलला पाहिजे. त्यामुळेच ज्या गोष्टी वास्तव व जबरदस्त आहेत, असे आपणास वाटते,त्या वस्तुतःअवास्तव व मृत्यूच्या पाशात नेणाऱ्या आहेत,याची जाणीव होईल.जे नवे जग अस्तित्वात येण्याची शक्यता आहे.त्या जगात प्रवेश करण्यासाठी आपण तयारी,इतकेच काय पण उत्सुकता व्यक्त केली पाहिजे.केवळ नकारात्मक मार्गाचा अवलंब करून आपण शांततामय जगाची रचना करू शकणार नाही.आम्ही युद्ध करणार नाही,एवढेच म्हणणे पुरेसे नाही.शांततेसाठी कळकळ दाखविणे व तीसाठी त्याग करणे आवश्यक आहे.युद्ध नकारात्मक उच्चाटन करण्यावर केवळ आपण लक्ष केंद्रित न करता शांततेच्या सक्रिय पुनरुच्चारावर भर दिला पाहिजे.


ग्रीक वाड्मयात युलिसिस व सायरन जमात यांच्याविषयी एक रमणीय कथा आहे.सायरन लोक इतके मधुर गात की,त्यांचे गायन ऐकण्यासाठी त्यांच्या बेटाकडे गलबत वळविण्याचा मोह खलाशांना आवरत नसे.या गायनाच्या मोहामुळे ते आपली गलबते या खडकाळ बेटाकडे वळवीत.गलबतातील खलाशी आपले घरदार,

कर्तव्य व प्रतिष्ठा विसरून गायनाच्या मोहाने समुद्रात उड्या टाकत आणि मृत्युमुखी पडत.युलिसिसने सायरन लोकांच्या मोहाला बळी पडावयाचे नाही,असा निर्धार केला.त्याने प्रथम गलबतावरील शिडाला स्वतःला बांधून टाकण्याचे ठरविले आणि त्याच्या खलाशांनी आपले कान मेणाने बुजवून टाकले. पण अखेर स्वतःचा बचाव करण्याचा अधिक चांगला मार्ग त्यांना सुचला.त्यांनी आपल्या गलबतावर ऑफियस या उत्कृष्ट गवयाला घेतले.सायरन लोकांच्या संगीतापेक्षा त्याची गीते अधिक नादमधुर होती.ऑफियस गाऊ लागला की,सायरनांचे गायन ऐकण्याची कोण फिकीर करतो? यासाठी आपण युद्धाचे केवळ नकारात्मक उच्चाटन करण्याकडे लक्ष न देता शांततेचा सक्रिय पुनरुच्चार करण्यावर भर दिला पाहिजे.युद्धाच्या बदसुरापेक्षा कितीतरी श्रेष्ठ असे आणि मधुर संगीत - स्वर्गीय संगीत शांततेच्याद्वारे प्रगट होईल,

इकडे लक्ष दिले पाहिजे.जी कोणालाही जिंकता येणार नाही, अशी नकारात्मक अधिक अस्त्रांची शर्यत थांबविली पाहिजे आणि तीऐवजी जगातील सर्व राष्ट्रांच्या हितासाठी शांतता व भरभराट यांना मूर्त स्वरूपाच्या म्हणून माणसाने सृजनशीलतेचा उपयोग करण्याची सक्रिय शर्यत सुरू केली पाहिजे.थोडक्यात शस्त्रास्त्रांच्या शर्यतीऐवजी शांततेसाठी शर्यत चालू झाली पाहिजे.जर आपण शांततेसाठी निर्धाराने अशी मोहीम सुरू केली तर आतापर्यंत आशेचे जे दरवाजे घट्टपणे बंद राहिले होते,ते आपण उघडू शकू आणि संभाव्य विश्वसंहाराच्या विलापगीतांचे रूपांतर सृजनशील पूर्तीच्या स्तोत्रांत करू.

थोडक्यात वांशिक अन्याय,दारिद्र्य व युद्ध या समस्या सोडविण्यावर माणसाचे अस्तित्व अवलंबून आहे.आणि माणूस आपल्या वैज्ञानिक प्रगतीबरोबरच नैतिक प्रगती कशी किती करतो आणि एकोप्याने राहण्याची व्यवहारी कला कितपत शिकतो,यावर वरील समस्यांची सोडवणूक अवलंबून आहे.


जो प्रेम करीत नाही तो परमेश्वराला ओळखीत नाही !


काही वर्षांपूर्वी एक विख्यात कादंबरीकार निधन पावला.त्याच्या कागदपत्रांत नियोजित कादंबऱ्यांच्या कथासूत्रांची यादी होती.त्यांतील एक महत्त्वाचे कथासूत्र पुढीलप्रमाणे होते.खूप ठिकाणी विखुरलेल्या एका कुटुंबाला वारसाहक्काने एक घर मिळाले आणि या घरात त्यांना एकत्र राहणे भाग पडले.मानवजातीपुढील ही एक मोठी समस्या आहे.आपल्याला वारसाहक्काने एक मोठे घर जगरूपी विशाल घर मिळाले आहे.या घरात काळे व गौरकाय, पौर्वात्य व पाश्चिमात्य,जेन्टाईल व ज्यू,कॅथॉलिक व प्रॉटेस्टंट,मुसलमान व हिंदू अशा सर्वांनी एकोप्याने रहावयास शिकले पाहिजे. विचारसरणी,संस्कृती व हितसंबंध या बाबतीत गैरवाजवी रीतीने विभक्त झालेले हे कुटुंब आहे. यापुढे आपणांस एकमेकांशिवाय जगणेच अशक्य असल्यामुळे आपण काही झाले तरी या विशाल जगात एकोप्याने रहाण्यास शिकले पाहिजे.याचा अर्थ आपल्या निष्ठा विभक्त असण्यापेक्षा अधिकाधिक प्रमाणात जागतिक झाल्या पाहिजेत.आपल्या वैयक्तिक समाजात जे काही सर्वोत्कृष्ट आहे.त्याचे जतन करण्याकरिता आपण समुच्चयाने मानवजातीविषयी सर्वांत जास्त निष्ठा व्यक्त केली पाहिजे.विश्वबंधुत्वा

साठी दिले गेलेले हे आवाहन म्हणजे वस्तुतः सर्व मानवजातीविषयीसर्वंकष व बिनशर्त प्रेम दाखविण्याचे आवाहन आहे. स्वतःची जमात,वंश,वर्ग व राष्ट्र यांच्या पलीकडे अधिक विशाल दृष्टिकोन ठेवण्याचे हे आवाहन आहे.अखंड जगाचा या कल्पनेविषयी बराच गैरसमज होता आणि त्या कल्पनेचा चुकीचा अर्थ लावला जात होता.तिच्यावर नीत्शेने तीव्र दुबळेपणाचा व भेकडपणाचाच शिक्का मारला होता.पण आज मानवजात टिकविण्यासाठी ही कल्पना अगदी आवश्यक झाली आहे.जेव्हा मी प्रेमाविषयी बोलतो,तेव्हा काही तरी भावनात्मक व दुबळी विचारसरणी व्यक्त करत नाही.त्यात वायफळ बडबडीपेक्षा काहीतरी विशेष अर्थ आहे.सर्व महान धर्मांनी जीवनातील सर्वश्रेष्ठ ऐक्याचे तत्त्व म्हणून जी शक्ती मानली त्या शक्तीसंबंधी मी बोलत आहे.प्रेम म्हणजे अंतिम सत्याचे दार उघडण्याची किल्ली होय. अंतिम सत्यासंबंधीच्या हिंदू,मुसलमान,

ख्रिश्चन, ज्यू व बौद्ध या धर्मीयांच्या या कल्पनेचे समालोचन सेंट जॉन यांच्या पहिल्या पत्ररूपी प्रवचनात उत्तम रीतीने केले गेले आहे.


आपण एकमेकांवर प्रेम करूया;कारण प्रेम म्हणजे परमेश्वर,आणि प्रेम करणाऱ्या प्रत्येकाचा जन्म परमेश्वरापासून झाला असून तो परमेश्वराला ओळखतो.जो प्रेम करीत नाही तो परमेश्वराला ओळखत नाही.कारण परमेश्वर म्हणजे प्रेम आहे.जर आपण एकमेकांवर प्रेम केले तर आपल्यात परमेश्वराचे वास्तव्य राहते आणि त्याचे प्रेम आपल्यातील प्रेमाला परिपूर्णता आणते.


उद्धार तरी होईल किंवा सर्वनाश तरी होईल


ही वृत्ती सगळीकडे फैलावेल,अशी आपण आशा करूया.ॲर्नल्ड टॉइन्बी म्हणतात,"मृत्यू व अनिष्टता या तिरस्करणीय निवडीपेक्षा जीवन व सत् या चांगल्या निवडी करण्यातील प्रेम ही अंतिम शक्ती आहे.

म्हणून प्रथम आपल्याला अशी ओढ लागली पाहिजे की,प्रेम हाच अंतिम शब्द राहील.यापुढे आपल्याला द्वेषाच्या देवतेची पूजा करून किंवा टोल्यास टोला या विचारसरणीपुढे नमून चालणार नाही. अधिकाधिक जोराने उफाळणाऱ्या द्वेषरूपी लाटांमुळे इतिहासाचे महासागर खवळले जातात.द्वेषाचा आत्मघातकी मार्ग अवलंबून ज्यांनी नाश करून घेतला अशा राष्ट्रांच्या व व्यक्तींच्या उदाहरणांनी इतिहास नटलेला आहे.आता जगापुढील समस्या सोडविण्याची प्रेम ही एकच किल्ली आहे."


समारोप करताना मी हे सांगू इच्छितो की, मानवजात या काळात कसोटीत उतरेल आणि विनाशाकडे झपाट्याने चाललेल्या या युगाला नवी गती देईल.या काळातील परिस्थिती तंग व अनिश्चित असूनही काही तरी अतिशय अर्थपूर्ण घडत आहे.पिळवणूक व दडपशाही यांच्या जुन्या व्यवस्था ढासळून पडत आहेत आणि निःसत्त्व भासणाऱ्या या जगातून न्याय समता यांच्या व्यवस्था उदयास येत आहेत.पददलित लोकांपुढे संधीची द्वारे हळूहळू खुली होत आहेत,आणि राष्ट्रातील वस्त्रहीन व अनवाणी लोकांमध्ये आपण कोणी तरी आहोत ही भावना निर्माण होत आहे आणि निराशेच्या निबिड पर्वतांतून ते आशेचा बोगदा काढत आहेत.


अंधकारात जीवन कंठत असलेल्या लोकांना महान प्रकाश दिसू लागला आहे;काही ठिकाणी, व्यक्तींनी व गटांनी प्रेमाची प्रवृत्ती व्यक्त करून नैतिक प्रगल्भतेची भव्य उंची गाठली आहे. खऱ्याखुऱ्या अर्थाने जीवन जगण्याच्या दृष्टीने हा महान काळ आहे.याचमुळे भविष्यकाळाविषयी मी अद्याप निराश झालेलो नाही.

भूतकाळातील सहजसुलभ आशावाद आज अशक्य झाला असेल,शांतता व स्वातंत्र्य यांच्या लढ्यात आघाडीला असणाऱ्या लोकांना अद्यापही तुरुंगवासात दिवस कंठावे लागत असतील, आणि त्यांना ठार करण्याच्या धमक्या दिल्या जात असतील,त्यांचा एकसारखा छळ केला जात असेल आणि या छळामुळे आपण हा थोडा बोजा सहन करू शकणार नाही अशी निराशेची भावना त्यांच्यात निर्माण होण्याचा आणि अधिक शांत व समाधानी जीवनाचा अवलंब करण्याचा मोह त्यांना होण्याचा संभव असेल,आज आपणामुळे जागतिक पेचप्रसंग निर्माण झाला असेल आणि त्यामुळेच जीवनाच्या खवळलेल्या संग्रामात आपण गुरफटून गेलो असू पण प्रत्येक आणीबाणीच्या प्रसंगांत जसे धोके असतात तशी संधीही मिळते.त्यामुळे उद्धार तरी होईल किंवा नाश तरी होईल.या निबिड त्रस्त जगात अद्यापही माणसांच्या अंतःकरणात परमेश्वराचे राज्य होणे शक्य आहे.

३१/३/२४

अखेरचे आवाहन.. Last call (1)

मार्टिन ल्यूथर किंग ज्यु.

(१९२९ जानेवारी१५-१९६८ एप्रिल ४)


"हिंसा अनैतिक आहे;कारण प्रेमापेक्षा द्वेषावर तिचा भर असतो.हिंसेमुळे समाजाचा नाश होतो आणि भ्रातृभाव अशक्यप्राय होतो.हिंसेमुळे समाजात सहकार्याऐवजी विभक्तपणाची प्रवृत्ती निर्माण होते.हिंसेमुळे पराभूत लोकांत कडवटपणा आणि विजेत्यांत पाशवी वृत्ती निर्माण होते.हिंसेचा शेवट अखेर खुद हिंसेच्याच पराभवात होतो.,नागरिक हक्कांच्या चळवळीचे नेते मार्टिन ल्यूथर किंग यांनी नॉर्वेतील ऑझ्लो विद्यापीठात शांततेच्या नोबेल पारितोषकाचा स्वीकार करताना केलेले उत्स्फूर्त भाषण.


आजच्या काळातील मानवाने सर्व जगापुढे भावी काळाचे अचंबा वाटण्याजोगे चित्र उभे केले आहे.वैज्ञानिक यशाची नवी व आश्चर्यकारक शिखरे त्याने पादाक्रांत केली आहेत. माणसांप्रमाणे विचार करू शकणारी यंत्रे आणि विश्वमालेतील अनंत अवकाशाचा ठाव घेणारी उपकरणे त्यांनी तयार केली आहेत.सागर उल्लंघण्यासाठी प्रचंड पूल,तसेच गगनचुंबी भव्य इमारती बांधल्या गेल्या आहेत.

माणसाने तयार केलेल्या विमानामुळे व अवकाशयानामुळे अनंत कःपदार्थ बनले आहे,काळाला मर्यादा पडली आहे.

आणि अवकाशातून हमरस्ते केले गेले आहेत.आधुनिक काळातील माणसाने केलेल्या शास्त्रीय व तांत्रिक प्रगतीचे हे नेत्रदीपक चित्र आहे.पण विज्ञानाच्या व तंत्रशास्त्राच्या क्षेत्रात इतकी भव्य प्रगती होऊनही आणि भावी काळात अमर्याद प्रगती होण्याची चिन्हे दिसत असूनही काही तरी मूलभूत हरपलेले आहे,असे वाटते.आजच्या जगात आत्मिक तेजाचे दारिद्र्य भासते.विशेषतः आपल्या वैज्ञानिक व तांत्रिक समृद्धतेच्या पार्श्वभूमीवर हे दारिद्र्य प्रकर्षाने जाणवते.आपण आधिभौतिकदृष्ट्या अधिक सधन झालो आहोत पण नैतिक व आध्यात्मिकदृष्ट्या अधिक दरिद्री झालो आहोत. आपण आकाशात पक्ष्यांप्रमाणे विहार करण्यास आणि सागरात माशांप्रमाणे तरंगण्यास शिकलो आहोत,पण भाऊ भाऊ म्हणून एकत्र राहण्याची साधी कला मात्र आपण शिकलो नाही.


प्रत्येक मनुष्य दोन जगात वावरत असतो,एक अंतर्गत व दुसरे बाह्य.अंतर्गत जग हे आध्यात्मिक आकांक्षांचे जग असून ते कला, वाड्मय,नैतिक मूल्ये व धर्म यांच्याद्वारे व्यक्त होते.बाह्य जग हे विविध साधने,तंत्रे,यांत्रिकी व्यवस्था व उपकरणे यांनी युक्त असून त्यांच्या साहाय्याने आपण जीवन कंठीत असतो.आपण आपले अंतर्गत जग बाह्य जगात का लुप्त होऊ दिले,हीच आज आपल्या

पुढील समस्या आहे. ज्या साध्यासाठी आपण जगतो,त्या साध्यावर आपण साधनांची मात होऊ दिली आहे.


थोडक्यात कविवर्य थोरो यांच्या पुढील उद्बोधक वचनात आधुनिक जीवनाचे समालोचन करता येईल,"न सुधारलेल्या साध्यासाठी सुधारलेली साधने," जर मानवजातीला अस्तित्वात रहावयाचे असेल तर मानवानी आपल्यातील नैतिक व आध्यात्मिक क्षेत्रातील

मागासले पणा घालविला पाहिजे.वाढत्या आधिभौतिक शक्तीच्या प्रमाणात जर आत्मिक बल वाढले नाही तर जगात अधिक प्रमाणात प्रलय होईल.जेव्हा माणसाच्या स्वभावातील बाह्य प्रवृत्ती आंतरिक शक्तीवर विजय मिळवते,तेव्हा जगात वादळाचे काळे ढग जमू लागतात.


आध्यात्मिक व नैतिक मागासलेपणा ही आधुनिक काळातील माणसापुढील मुख्य समस्या आहे.माणसाच्या नैतिक ऱ्हासातून जे तीन व्यापक प्रश्न उद्भवतात,त्यांतून ही समस्या व्यक्त होते.हे तीन प्रश्न वेगवेगळे असतात,पण ते एकमेकांत गुंतलेले आहेत.हे तीन प्रश्न म्हणजे अन्याय,

दारिद्र्य व युद्ध होत.प्रथम मी वांशिक अन्यायाचा उल्लेख करतो.वांशिक अन्यायाचे पाप नष्ट करण्यासाठी चाललेला लढा हा आजच्या काळात एक मोठा लढा आहे. अमेरिकेतील निग्रोत आज जागृती झालेली दिसत आहे.स्वातंत्र्य व समानता मूर्त स्वरूपात आणण्याच्या नितांत व तीव्र श्रद्धेतून ही जागृती झाली आहे.


उद्ध्वस्त जीवनाची प्रलयंकर गर्जना


ज्या काळात सामाजिक संस्कृतीतील मूलभूत दृष्टिकोन बदलत आहे अशा काळातच आपण वावरत आहोत,असे आल्फ्रेड नॉर्थ व्हाइटहेड हे तत्त्वज्ञ म्हणतात.इतिहासातील हा एक महत्त्वाचा टप्पा आहे.ज्या गृहीत तत्त्वावर समाजव्यवस्था आधारलेली आहे,त्या तत्त्वांचे पृथक्करण केले जात आहे, त्यांना जोराचे आव्हान दिले जात आहे.आणि त्यात मोठे बदल होत आहेत.आज जग स्वातंत्र्याच्या वृत्तीने भारलेले आहे.व्हिक्टर ह्यूगोच्या शब्दांत सांगावयाचे म्हणजे या विचारसरणीला मूर्त स्वरूप लाभण्याची वेळ आली आहे.आज आपल्याला असंतोषाचा मोठा घरघराट ऐकू येत आहे.हा घरघराट म्हणजे ज्यांचे जीवन उद्ध्वस्त झाले आहे अशा जनतेची मेघगर्जना आहे.ही जागृत झालेली जनता गांजवणुकीच्या खाईतून स्वातंत्र्याच्या उज्ज्वल शिखरावर आरूढ होऊन एका भव्य आवाजात स्वातंत्र्याची गर्जना करत आहे.जगातील अत्यंत व्यापक असा हा विमोचनाचा काळ आहे.या काळात आगीच्या वणव्याप्रमाणे सर्व जगात स्वातंत्र्याची चळवळ पसरत आहे.आपले वंश व आपला देश यांची पिळवणूक थांबविण्याचा प्रचंडसंख्याक जनतेने निर्धार केला आहे.

प्रत्येक खेड्यात,रस्त्यावर,गोद्यांत,घरात,विद्यार्थ्यांत, प्रार्थनामंदिरांत व राजकीय सभांत स्वातंत्र्याचा हा घरघराट ऐकू येत आहे.अनेक शतकांपर्यंत ही ऐतिहासिक चळवळ या पश्चिम युरोपातील राष्ट्र व समाज यापुरतीच मर्यादित होती.बाकीच्या जगाला अनेक प्रकारे नागवण्यात ही राष्ट्र गुंतली होती.तो काळ,वसाहतवादाचे युग आता संपलेले आहे.पूर्व व पश्चिम यांचा मिलाफ होत आहे. 


जगाची फेर वाटणी होत आहे.आपल्या मूलभूत दृष्टिकोनात बदल होत आहे.या घडामोडीमुळे इतिहासाच्या कोणत्याही विद्यार्थ्याला आश्चर्य वाटणार नाही.पददलित लोक कायमचे पददलित राहणार नाहीत.स्वातंत्र्याची आकांक्षा अखेर व्यक्त होतेच. अनेक शतकांपूर्वी मोझीझने कैरोच्या न्यायालयात "माझ्या लोकांना जाऊ द्या," ही घोषणा कशी केली त्याची रोमांचकारी कथा बायबलात आली आहे.अखंड चालू असलेल्या कथेचे ते जणू काय सुरूवातीचे प्रकरण होते.


अमेरिकेतील सध्याचा लढा याच अखंड कथेतील एक नंतरचे प्रकरण आहे.काही तरी आंतरिक शक्तीने निग्रोंना त्यांच्या स्वातंत्र्याच्या जन्मसिद्ध हक्काची जाणीव करून दिली आहे आणि काहीतरी बाह्य शक्तीने त्याला हे स्वातंत्र्य मिळविता येईल,हे पटवून दिले आहे.


अमेरिकेतील निग्रोंचे स्वातंत्र्याचे स्वप्न मूर्त स्वरूपात आणण्यासाठी अद्याप कितीतरी मजल मारावयाची आहे.बायबलातील आलंकारिक भाषेत सांगावयाचे म्हणजे इजिप्तमधील धुळीने भरलेल्या प्रदेशातून आम्ही निघालो आणि प्रदीर्घ व अतिशय तीव्र झोंबणाऱ्या हिवाळ्यामुळे अनेक वर्षे गोठून गेलेला तांबडा समुद्र आम्ही ओलांडला.पण आश्वासित समृद्ध प्रदेशाच्या भव्य किनाऱ्यापर्यंत जाऊन पोहोचण्यापूर्वी निराशाजनक व त्रस्त करणाऱ्या वैराण मुलखातून आम्हाला जावे लागणार आहे. आम्हाला अद्यापही विरोधाची उत्तुंग शिखरे व प्रतिकाराचे प्रचंड पर्वत ओलांडावयाचे आहेत. पण धिम्या व दृढ निश्चयाने आम्ही मार्गक्रमण करीत राहू आणि अशा रीतीने निराशेच्या प्रत्येक दरीचे रूपांतर उत्तुंग आशेच्या व दयेच्या शिखरात करू.अहंकाराचा व असमंजसपणाचा प्रत्येक पर्वत नम्रतेच्या व दयेच्या साधनांनी सखल करू.

अन्यायाच्या खबदाडाचे रूपांतर समान संधीच्या सपाट प्रदेशात करू आणि पूर्वग्रहांच्या वेड्यावाकड्या स्थळांचे स्वरूप सुजाणतेच्या प्रवृत्तीने पालटून टाकू.


इतिहासातील अपूर्व शस्त्र : अहिंसा


स्वातंत्र्य,समानता,रोजंदाऱ्या व नागरिकत्व या संबंधीची मागणी सोडावयाची नाही किंवा तीत भेसळ करावयाची नाही किंवा ती लांबणीवर टाकावयाची नाही,अशी अमेरिकेतील नागरिक हक्कांच्या चळवळीतील मुख्य गटांची भूमिका आहे.त्यासाठी प्रतिकार व झगडा करावा लागला तरी आम्ही माघार घेणार नाही.आम्ही नमणार नाही.आम्ही आता घाबरणार नाही.आचार व विचार या दोन्ही दृष्टीनी अहिंसा हे आमच्या लढ्याचे अधिष्ठान आहे आणि त्याचमुळे या लढ्यातील एका सैनिकाला शांततेचे नोबेल पारितोषिक देणे समर्पक वाटले असावे.स्थूल मानाने बोलावयाचे म्हणजे नागरिक हक्काच्या चळवळीत अहिंसेचा अवलंब याचा अर्थ या लढ्यात शस्त्रास्त्रांवर अवलंबून न राहण्याचे धोरण.याचा अर्थ विषमता व गुलामगिरीचा पुरस्कार करणाऱ्या राजवटीचे रिवाज व कायदे यांच्याशी असहकार.

याचा अर्थ प्रतिकाराच्या चळवळीत जनतेचा प्रत्यक्ष सहभाग.अप्रत्यक्ष मार्गावर भर दिला तर जनतेला प्रत्यक्ष कृतीत सहभागी होण्याची संधी बऱ्याच वेळा मिळत नाही,असा अनुभव आहे.अहिंसा याचा अर्थ असाही आहे की,अलीकडच्या काळातील कष्टप्रद लढ्यात भाग घेतलेले माझे सहकारी बांधव इतरांना क्लेश न देता स्वतः क्लेश सहन करीत आहेत. यापूर्वी मी म्हटल्याप्रमाणे यापुढे आम्ही घाबरणार नाही किंवा नमणार नाही; पण त्याबरोबर बऱ्याच प्रमाणात हेही खरे आहे की, इतरांना किंवा ज्या समाजाचे आम्ही घटक आहोत,त्या समाजाला घाबरून सोडण्याचा आमचा हेतू नाही.गौरकाय लोकांची मानहानी करून आणि त्यांना गुलाम करून निग्रो लोकांचे विमोचन करणे हा या चळवळीचा हेतू नाही.आम्हाला कोणावरही विजय मिळवावयाचा नाही.अमेरिकन समाजाचे विमोचन करणे आणि सर्व जनतेच्या विमोचनात सहभागी होणे,हा आमच्या चळवळीचा उद्देश आहे.

वांशिक न्याय मिळविण्यासाठी हिंसेचा मार्ग अव्यवहार्य व त्याचबरोबर अनैतिक आहे. बऱ्याच वेळा राष्ट्रांनी लढाई करून स्वातंत्र्य मिळविले आहे;पण तात्पुरते विजय मिळाले तरी हिंसेमुळे चिरस्थायी शांतता होत नाही.

हिंसेमुळे सामाजिक प्रश्न सुटत नाहीत,उलट नवीन व अधिक गुंतागुंतीचे प्रश्न उद्भवतात.हिंसा अव्यवहार्य आहे.कारण तीमुळे अधोगती होत जाऊन अखेर सर्वांचाच नाश होतो. हिंसा अनैतिक आहे,कारण सुज्ञपणे विरोधकांना आपलेसे करण्यापेक्षा तीत विरोधकांची मानहानी करण्याची प्रवृत्ती असते,हृदयपरिवर्तन करण्यापेक्षा द्वेषावर तिचा भर असतो.हिंसेमुळे समाजाचा नाश होतो,आणि भ्रातृभाव अशक्यप्राय होतो.हिंसेमुळे समाजात सहकार्याऐवजी विभक्तपणाची प्रवृत्ती निर्माण होते.हिंसेमुळे पराभूत लोकात कडवटपणा आणि विजेत्यांत पाशवी वृत्ती निर्माण होते.खुद्द हिंसेचा शेवट अखेर खुद्द हिंसेच्या पराभवात होतो.खऱ्याखुऱ्या अर्थी अहिंसा ही माणसातील आध्यात्मिक व नैतिक मागासलेपणा घालवू पाहते.यापूर्वी मी म्हटल्याप्रमाणे हाच मागासलेपणा म्हणजे आजच्या काळातील माणसापुढील मुख्य समस्या आहे. अहिंसा ही नैतिक साधनांद्वारे नैतिक उद्दिष्टे साध्य करू पाहते.अहिंसा हे प्रभावी व न्याय्य शस्त्र आहे इतिहासात अपूर्व असे हे शस्त्र आहे. जखम न करता अहिंसा शस्त्रक्रिया करते, आणि हे शस्त्र पेलणारा माणूस स्वतः उदात्त बनतो

.अहिंसेच्या साधनावर माझा विश्वास आहे.मला वाटते,भंगलेल्या समाजाचे पुनरुत्थान करण्याचा हाच एकमेव मार्ग आहे. ज्यांनी अंधवृत्ती,भीती,अहंकार व असमंजसपणा यांच्या आहारी जाऊन आपल्या सदसद्विवेकबुद्धीकडे दुर्लक्ष केले आहे,अशा प्रचंड बहुसंख्याक लोकांच्या सदसद्विवेकबुद्धीला आवाहन करून न्याय्य कायदा अंमलात आणण्याचा अहिंसा हाच मार्ग आहे.


अणुयुद्धांची भयानक समस्या..


अहिंसेच्या मार्गाने प्रतिकार करणाऱ्यांना आपल्या संदेशाचे समालोचन पुढील सुलभ शब्दांत करता येईल.अन्यायाविरुद्ध सरकारी व इतर अधिकृत यंत्रणांनी जरी आवश्यक ती उपाययोजना प्रथम केली नाही.

तरीसुद्धा आम्ही अन्यायाविरुद्ध उघडउघड झगडू.आम्ही अन्यायी कायदे मानणार नाही किंवा अन्याय्य रिवाजापुढे नमणार नाही.अर्थात आम्ही हे सर्व शांतपणे, उघडपणे,

आनंदाने करू,कारण हृदयपरिवर्तन करणे आमचे उद्दिष्ट आहे.आम्ही अहिंसेच्या साधनाचा अवलंब करीत आहोत,

कारण शांततावादी समाज हे आमचे उद्दिष्ट आहे.आम्ही आमची भूमिका स्पष्ट मांडून हृदयपरिवर्तन करण्याचा प्रयत्न करू,पण त्यात अपयश आले तर आम्ही प्रत्यक्ष आचरणाने हृदयपरिवर्तन करण्याचा प्रयत्न करू.

वाटाघाटी करण्यास आणि तडजोडी करण्यास आमची नेहमीच तयारी आहे.पण आम्हाला जे सत्य वाटते त्याचा आविष्कार व्हावा म्हणून जरूर तेव्हा क्लेश सहन करण्याची व प्रसंगी प्राण देण्याची आमची तयारी आहे.वांशिक अन्यायाच्या समस्येला प्रतिकार करण्यासाठी हे जे साधन स्वीकारले गेले आहे, त्याला पूर्वी यशही आले आहे.मोहनदास करमचंद गांधी यांनी ब्रिटिश साम्राज्याच्या प्रबळ सत्तेविरुद्ध याच साधनाचा उत्कृष्ट रीतीने उपयोग केला,आणि अनेक शतकांच्या राजकीय वर्चस्वातून व आर्थिक पिळवणुकीतून भारतीय जनतेची मुक्तता केली.

गांधीजींनी फक्त सत्य,आत्मबल,अहिंसा व धैर्य या अस्त्रांचा उपयोग केला.गेल्या दहा वर्षांत अमेरिकेतील निःशस्त्र स्त्री-पुरुषांनी अहिंसेच्या नैतिक शक्तीची व परिणामकारकतेची कृतीने साक्ष पटवून दिली आहे.हजारो अज्ञात व निर्भय निग्रो व गौरकाय तरुणांनी शिक्षणाला तात्पुरता रामराम ठोकून देहदंड सोसला.अन्यायाच्या उष्णतेने रणरणत असलेल्या वाळवंटात त्यांचे धीरोदात्त व शिस्तबद्ध कार्य म्हणजे आल्हाददायक हिरवळच होय.

त्यांनी सर्व अमेरिकन लोकांना लोकशाहीच्या महान जलाशयाकडे पुन्हा नेले आहे.अमेरिकन राष्ट्राच्या संस्थापकांनी राज्यघटना व स्वातंत्र्याचा जाहीरनामा तयार करून ही लोकशाहीची समृद्ध जलाशये खोदली आहेत.

एक दिवस सर्व अमेरिकेला त्यांच्या कार्याचा अभिमान वाटेल.(गांधी नावाचे महात्मा, संपादक - रॉय किणीकर,साहाय्यक,अनिल किणीकर,डायमंड पब्लिकेशन्स)


माणसाचे दौर्बल्य व अपयश यांची मला चांगलीच जाणीव आहे.अनेकजण अहिंसेच्या परिणामकारते

विषयी शंका घेऊन हिंसेचा उघड पुरस्कार करतात;

पण शतकानुशतकांच्या वांशिक अन्यायाला प्रतिकार करण्यासाठी अहिंसा हे सर्वात व्यवहार्य व नैतिकदृष्ट्या सर्वोत्कृष्ट साधन आहे अशी माझी अद्यापही खात्री आहे.


उर्वरित भाग पुढील ०२.०४.२४ रोजीच्या लेखामध्ये…!

२९/३/२४

रजनीगंधा एक आठवण..!! A memory of Rajnigandha..!!

मुंबई शहरात तसंच उपनगरांत माझे अनेक परिचित आहेत.हा बहुधा माझ्या साहित्याचा वाचकवर्ग आहे.मात्र मित्र हाताच्या बोटांवर मोजण्याइतके आहेत.सुमंतभाई माझे मित्र आहेत.तसं आमच्या वयात खूप अंतर आहे. त्यांची पहिली भेट नवेगावबांध येथे १९७५ सालच्या डिसेंबर महिन्यात झाली.अशीच ती कडक थंडीची सायंकाळ होती.माझ्या अभ्यासिकेत मी वाचत बसलो होतो.इतक्यात माझ्या शिपायानं एक ओळखपत्र आणून दिलं. त्यावर लिहिलं होतं,सुमंत शहा,बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचा सभासद,मी लगेच बाहेर आलो,तो माझ्या

समोर एक वृद्ध गृहस्थ उभे होते.चणीनं बुटके.किंचित स्थूल.प्रवासामुळे कपडे मळलेले.बरोबर एक सडपातळ,

गोरी,वयस्क स्त्री होती.ती त्यांची पत्नी असावी.

बसस्टँडवरून आलेल्या हमालाच्या डोक्यावर एक भली मोठी काळी ट्रंक होती.तो अजून उभा होता.ट्रंक जड झाल्यामुळं तो जरा अस्वस्थ झाला होता.मी त्या दोघांना घरात बोलावलं.हमालाला ती ट्रंक घराच्या व्हरांड्यात ठेवायला सांगितलं.नंतर बैठकीच्या खोलीत बसून चहा-पाणी झालं. त्यांना म्हटलं,"आपण प्रवासानं थकून आलात. आता चांगलं गरम पाण्यानं स्नान करा.विश्रांती घ्या.मी थोड्या वेळानं विश्रामगृहावर तुम्हाला घेण्यासाठी येईन.आज जेवण माझ्याकडं करा."


त्यावर ते म्हणाले,"आपण कशाला त्रास घेता. आमच्याजवळ रेशन बॉक्स आहे.स्टोव्ह आहे. आम्ही स्वतः स्वयंपाक करून जेवण करू."


"ते उद्या करा. आज माझे आपण पाहुणे.


त्या दोघा पति-पत्नीचा चेहरा उजळला.अशा थकलेल्या अवस्थेत देखील त्यांच्या चेहऱ्यावरचं स्मित पाहून मला आनंद झाला.या भेटीनंतर अनेक वर्षांनी ते एकदा ह्या पहिल्या भेटीची मला आठवण करीत म्हणाले."

चितमपल्ली साहेब,वुई लव्ह यू.तुम्ही तसे मोठे सुंदर आहात असं नव्हे, तुमच्या अंतःकरणाच्या सौंदर्यानं आम्ही तुमच्यावर फिदा झालो."


आज या गोष्टीला पंधरा वर्षे लोटली.पण माझा सुमंत

भाईंना यत्किंचितही विसर पडला नाही.त्यांना मराठी येत नाही अन् मला गुजराती.आम्ही भेटलो की इंग्रजीत बोलतो.तर कधी हिंदीत.त्यांनी माझं लेखन वाचलं नाही.ते अधून-मधून बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या जर्नलमध्ये 'व्हॅली ऑफ फ्लॉवर' विषयी किरकोळ टिप्पणी लिहितात.ते फुलांचे उत्कृष्ट फोटोग्राफर आहेत 'व्हॅली ऑफ फ्लॉवर'चा पहिला परिचय त्यांच्याकडून झाला.

वयाच्या साठाव्या वर्षी ते मुंबईतील एका शिपिंग कंपनीमधून सेवानिवृत्त झाले.पण हिमालयातील 'व्हॅली ऑफ फ्लॉवर'ला ते वयाच्या बाविसाव्या वर्षापासून भेट देतात.पहिल्यांदा एकटे जायचे. नंतर लग्न झाल्यावर पत्नीसह.अगदी एका वर्षाच्या आपल्या मुलाला ते घेऊन जाऊ लागले. एखाद्या पवित्र स्थळाला जावं तसं हे तिघं दरवर्षी नियमितपणे 'व्हॅली ऑफ फ्लॉवर'ला जात.परवा मुलाचं लग्न झालं.सूनही मिळाली ती निसर्गावर प्रेम करणारी.आता ते चौघे जातात.मुंबईला माझं क्वचितच जाणं होतं.तिथं एखादी ग्रंथयात्रा भरली किंवा पुस्तकाचं प्रदर्शन भरलं तर पुस्तक खरेदी करायला मी जातो.तसे सुमंतभाई ग्रंथप्रेमी नाहीत.वृत्तपत्र सोडलं तर फारसं काही वाचत नाहीत.भाभीजींना मात्र वाचनाची आवड आहे. त्यांच्या संग्रही चांगली गुजराती पुस्तकं आहेत. वेळ मिळाला,तर दुपारच्या वेळी एखादं गुजराती मासिक वाचताना दिसतात.माझ्या ग्रंथप्रेमाविषयी त्यांना आदर आहे.नवेगावबांधला आले तेव्हा माझा खाजगी ग्रंथसंग्रह पाहून उभयतांनी आश्चर्य व्यक्त केलं होतं.


सुमंतभाईंना पत्रानं कळवितो की,मी अमूक तारखेला अमूक गाडीनं मुंबईला पोचत आहे.गाडी धाडधाड करीत व्हीटी स्टेशनवर पोचते.माझी छाती धाडधाड होते.

सुमंतभाई नक्की स्टेशनवर असतील काय?कारण प्लॅटफॉर्मवर उतरल्यावर तिथल्या जनप्रवाहामुळं मी निराश होतो.दोन्ही बाजूंनी लोक मला धक्का देत निघून जात असतात.मी सुमंतभाईंना पाहत असतो. तोच ते दुरून येताना दिसतात.पांढरा शुभ्र पायजमा,अंगात तसाच कुडता,पायात चप्पल, चांदीसारखे दिसणारे केस व्यवस्थित विचरलेले,गुळगुळीत दाढी केलेली.हसतमुखानं ते जवळ येऊन हातात हात घेऊन स्वागत करतात.तेव्हा कुठं माझा जीव भांड्यात पडतो.टॅक्सीनं त्यांच्या लेमिंग्टन रोडवरील 'शक्ती सदन' या घरी पोचतो.भाभीजी आमची वाटच पाहत असतात.मग गप्पागोष्टी करीत चहा होतो.

नंतर स्नान केल्यावर मला प्रसन्न वाटू लागतं.तोपर्यंत भाभीजींनी नाश्ता तयार करून टेबलावर मांडलेला असतो.मला मधुमेह आहे हे माहीत आहे.नाश्त्याला मेथ्या घातलेलं थालिपीठ असतं. मला मुंबईत ग्रंथखरेदीला जायचं असतं.सकाळी दहा वाजता जेवण करून मी ग्रंथजत्रेत सुमंतभाईंबरोबर जाई ते रात्री परत येई.फक्त तिथं सोडायला आणि रात्री घ्यायला सुमंतभाई जत्रेच्या गेटपर्यंत येत.तिथून ते परत जात.आत येऊन त्यांनी कधीही ग्रंथ पाहिले नाहीत किंवा चाळलेही नाहीत.

दिवसभर मी प्रत्येक स्टॉलमध्ये जाऊन इंग्रजी,हिंदी,मराठी भाषेतील ग्रंथ पाहत, चाळीत,आवडलेलं पुस्तक खरेदी करी. रात्रीपर्यंत चांगली पाच- पन्नास पुस्तकं मी निवडलेली असत.माझ्या खांद्यावरची शबनमबॅग

पुस्तकांनी भरून गेलेली असे.ब्रीफकेसही.पुस्तकांचं तसं वजन फार असतं.नेमकं त्या ब्रीफकेसचं हँडल तुटून जाई.मी ती बगलेत धरून गेटवर त्यांची वाट पाहत उभा असे.मला म्हणायचे, "झाली का पुस्तक खरेदी?तुटली वाटतं ब्रीफकेस.आणा ती माझ्याकडे." ती वजनदार ब्रीफकेस बगलेत मारून ते पुढं चालू लागत.विनोदानं म्हणत,"कधी काळी तुम्ही फार मोठे लेखक झाला,तर माझी आठवण काढाल ना? तुमच्या ग्रंथाचं ओझं वाहून नेणारा म्हणून. मात्र तुमचं मला नेहमीच स्मरण होईल.

एका थोर माणसाची पुस्तकं बाहून नेण्याचं आपणाला भाग्य मिळालं म्हणून."माझ्या ग्रंथवेडा बद्दलची ही त्यांची टीकाटिपणी असे.एकदा रात्री मला नित्याप्रमाणं घ्यायला ते आले नाहीत.पुस्तकाचं भलं मोठं ओझं झालेलं.माझ्या ओळखीच्या स्टॉलवर ती पुस्तकं ठेवली.बरीच रात्र झाली.

स्टॉलमधील गृहस्थ म्हणाले,"साहेब, आता कुठं जाता? इथंच थांबा अन् सकाळी जा."त्या सज्जन गृहस्थानं दोन बाकं एकमेकांना जोडून त्यावर सतरंजी अंथरून दिल्यावर मी दिव्याच्या उजेडाचा त्रास होऊ नये म्हणून कपाळावर आडवा हात ठेवून झोपी जाण्याचा प्रयत्न करत होतो.मुंबई कधी शांत नसते. अहोरात्र ती गजबजलेली दिसते.जवळच्या स्टेशनवर येणाऱ्या- जाणाऱ्या गाड्यांच्या शिट्ट्यांचा आवाज येई.रस्त्यावरील बसगाड्या, मोटारींचा हॉर्न वाजे.मुंबई शहर मला कधी आवडलं नाही.त्याविषयी कधी आकर्षणही वाटलं नाही.

परंतु तिथं ग्रंथयात्रा भरे.चांगल्या ग्रंथांची आंतरराष्ट्रीय कीर्तीची प्रदर्शनं भरत. वर्षानुवर्षं ज्या पुस्तकांची मला आतुरतेनं वाट पाहावी लागे ती इथं मिळून जात.ती मिळाल्यावरचा आनंद एखाद्या ग्रंथप्रेमीलाच समजू शकेल.पहाटे केव्हातरी डोळा लागला.


कुणीतरी मला हाक मारून जागं करीत होतं. माझी झोप कावळ्यासारखी.मी लगेच जागा झालो.तो समोर सुमंतभाई उभे.म्हणाले,"अरे, तुमची आम्ही किती वाट पाहिली याल म्हणून, पण आला नाहीत.भाभीजीनं मला रात्रभर झोपू दिलं नाही.ती सारखं मला कोशीत होती की, तुम्हाला रात्री घ्यायला मी गेलो नाही म्हणून.मी चक्क ती वेळ विसरलो.थोडा आळस केला."


घरी आल्यावर भाभीजी म्हणाली,"सुमंतभाई मोठे विसरभोळे आहेत.घरीही त्यांचं असंच चालतं.त्यांना मिळालेला एखादा चेक किंवा ड्राफ्ट ते कुठंतरी ठेवतोल अन् विसरून जातील. मग त्या शोधात त्यांचा वेळ जातो.

मला ते शोधून द्यावं लागतं."शेवटी सुमंतभाई कबूल करायचे.ते गंमतीनं म्हणायचे,"चितमपल्ली साब ! शी इज माय हजबण्ड अँड आय एम हर वाईफ !"


"ते आहेच खरं.साऱ्या प्रवासात त्यांना सामानाची काळजी नसते.हमालाशी कसं बोलावं कळत नाही.तिकिटं सांभाळून ठेवीत नाहीत.मी जर त्यांच्च्याबरोबर प्रवासाला नसेन,तर ते आपल्या ठिकाणी कधीच पोचणार नाहीत.

तिकिटांचं आरक्षण मीच करायचं.खिडकीजवळ उभं राहून मी तिकिटं काढायची,ते हसत म्हणतात कसं, 'अगऽऽ, पुरुषांची रांग भली मोठी असते. स्त्रियांची रांग पहा.फक्त तीन-चार स्त्रिया रांगेत उभ्या आहेत.तेव्हा तूच तिकिटं काढ ना !" पण भाभीजी हे सारं हसण्यावारी नेतात.त्यांना सुमंतभाईंचा स्वभाव माहीत झाला आहे.त्या आपल्या नवऱ्याला पुरेपूर ओळखतात.पण खरं म्हणजे ती एकमेकांत कशी एकजीव झाली आहेत.राधा कृष्ण बनते.कृष्ण राधा होतो. दसऱ्याच्या दिवसांत गुजराती समाजात दुर्गापूजा मोठ्या उत्साहानं साजरी केली जाते.

सुमंतभाई एखादा दिवस तो सोहळा पाहायला मला बरोबर नेतात.तिथं गेल्यावर मन प्रसन्न होतं.


साऱ्या नवोढा माहेरवासिनी जमल्या आहेत.त्यांत वयात आलेल्या लाडक्या लेकीही आहेत. आधीच त्या रूपवान.

त्यात तारुण्याचा बहर अन् ह्या साऱ्यांना शोभेल असा साजशृंगार,अन् गात फेर धरीत एका लयीत टिपऱ्या खेळत आहेत. त्या लयबद्ध नृत्याकडं मी कितीतरी वेळ भान हरपून पाहत असे.मला भरतपूर पक्षिअभयारण्य व

त्यातील दिवस आठवले.तिथं माझं चांगले महिनाभर वास्तव्य होतं.तिथल्या चौहान या वनाधिकाऱ्याशी चांगलीच ओळख झाली.असाच काहीतरी सोहळा होता,

म्हणून त्यानं मला घरी जेवायला बोलावलं होतं.

सायंकाळची वेळ. त्यांच्या घराच्या अंगणात तरुण मुलं-मुली टिपऱ्या खेळत होती.माझा मित्रही त्यांच्यात समाविष्ट होता.थोड्या वेळानं ते सारे विश्रांतीसाठी थांबले.दुसऱ्या फेरीत चौहान म्हणाले,"चला चितमपल्ली साहेब,घ्या या टिपऱ्या.खेळा तरी बघू." मी प्रयत्न केला. दोघा-तिघा मुलींच्या टिपऱ्या माझ्या बोटांवर बसल्या,तेव्हा मी तो नाद सोडून दिला.एका प्रेक्षकाची भूमिका घेऊन त्यांच्या टिपऱ्या खेळतानाचं लयबद्ध नृत्य पाहत राहिलो.

आता इतकी वर्षं झालीत,परंतु गुजराती साडी ल्यालेल्या,

त्यांच्या काठावर हत्ती,घोडे,हरीण आणि सिंह यांची चित्रं रेखाटली आहेत,भरघोस पदर आहे,त्या साडीचा रंग मांजिठा म्हणजे लालभडक आहे.हे सारं पुढं येऊन मला ज्ञानेश्वरांची विराणी आठवतेय.


हत्ती घोडे हरण सिंहाडे ।

तैसे हे गुजराति लुगडे गे माये ॥१॥

पालव मिरवित गाईन । 

शेलापदरी धरून राहीन ॥२॥

बाप-रखुमादेवीवरू विठ्ठल सावळा ।

तेणे मज माजिठा दिला साऊळा ॥३


सकाळी लवकर उठून सुमंतभाईंबरोबर मी हँगिंग गार्डनला फिरायला जात असे.प्रामुख्यानं तिथं फिरायला यायची ती मंडळी गुजराती,जैन, मारवाडी,पारशी समाजातील असायची.गार्डन लहान,त्यामुळं तिथल्या तिथं लोक प्रदक्षिणा घालत.घाईनं कुणी चालत तर कुणी पळत असत.सारे सुखवस्तू घरातील.त्यामुळं शरीरानं गोल,जाड आणि मोठे असत.शेक्सपिअरनं एका ठिकाणी त्याला अशी माणसं आवडत असल्याचा उल्लेख केला आहे.


हँगिंग गार्डनच्या रस्त्याच्या कडेनं गुलाबी बहावा असा भरगच्च फुललेला असे.झाडाला एकही पान नाही.नुसती फुलंच फुलं.खाली गुलाबी पाकळ्यांचा सडा पडलेला.

फुलांच्या मंद गंधानं मी भावाकुल होत असे.कधी अमलतासाचं शिल्प उभं राही.हातभर लांबीच्या काळसर- तपकिरी पिकलेल्या शेंगा वृक्षावर एखाद्या बासरीसारख्या लोंबत आहेत.झाडावर कोवळी इवलीशी लाल लाल नाजूक पानं फुटत आहेत, साऱ्या झाडावर सोन्यासारखे फुलांचे झुंबर लोंबत आहेत,काही फुलली आहेत,तर काही गोलाकार कळ्यांवर आहेत.सोनवर्खी फुलं तर किती सुंदर दिसायची.ह्या फुललेल्या वृक्षांकडं पाहिलं की,मला सुंदर गुर्जर तरुणींच्या चेहऱ्याची आठवण व्हायची अन् असे चेहरे पाहिले की, सर्वांगानं बहरलेला अमलतास आठवायचा.मी सुमंतभाईंकडं गेलो अन् एक-दोन दिवसांचा मुक्काम असला,तर लवकुमार खाचर या पक्षितज्ज्ञाला जेवायला बोलवायला सुमंतभाई विसरायचे नाहीत.लवकुमार राजकोटचे राजपुत्र. धर्मकुमारसिंह या विख्यात पक्षिशास्त्रज्ञांचे ते शिष्य.ते वन्यजीव निधी या संस्थेतील निसर्गशिक्षणाचे प्रमुख होते.पहिल्यांदा लवकुमारांची ओळख सुमंतभाईंनीच करून दिली.नंतर आम्ही एकमेकांचे मित्र झालो. जगप्रसिद्ध छायाचित्रकार आश्विन मेहता यांची ओळख सुमंतभाईंनीच मुंबईतील एका मुक्कामात करून दिली.त्या वेळी त्यांनी नुकताच एका खाजगी कंपनीतील व्यवस्थापक ह्या हुद्याचा राजीनामा दिला होता.स्वतःचा छोटासा फ्लॅट होता.दोन सुंदर गोंडस मुली होत्या.असं मध्येच भरल्या संसारात नोकरी सोडून फोटोग्राफीचा छंद घेतलेला.मेहताबाईंनी सुमंतभाईंजवळ किंचित नापसंतीही दर्शविली.त्या व्यवहारी होत्या.कलाकार म्हणून ते श्रेष्ठ असतील,परंतु कुटुंबाची त्यावर उपजीविका होईल की नाही याबद्दल साशंक होत्या.त्यांचं काही चुकलं नव्हतं.त्यांच्या संग्रही असलेली उत्तम उत्तम छायाचित्रं पाहिली.नुकतेच ते 'झाड' या विषयावर जहांगीर आर्ट गॅलरीमधील प्रदर्शनाच्या तयारीत होते.वृक्षाचं प्रत्येक छायाचित्र म्हणजे सुंदर काव्य होतं.वृक्षाविषयी इतके संवेदनशील मन कुणाचं पाहिल्याचं आठवत नाही.झाडांविषयीची सखोल चिंतनशीलता त्यांच्या छायाचित्रांत डोकावत होती.समुद्राविषयी मला विलक्षण आकर्षण आहे.पश्चिम सागरकाठी मी पायी फिरलो आहे.समुद्राचं अभूतपूर्व सौंदर्य अनुभवलं आहे.तेच सौंदर्य त्यांच्या एका,

समुद्रकिनारा ह्या छायाचित्रप्रदर्शनात आढळून आलं.[शब्दांचं धन-मारुती चितमपल्ली,साहित्य प्रसार केंद्र,सीताबर्डी,नागपूर] तसंच त्यांनी दगडा-धोंड्याच्या छायाचित्रांतून शिळांचं जे शिल्प उभं केलं होतं ते देखील अद्वितीय होतं.जहांगीर आर्ट गॅलरीत हे प्रदर्शन पाहताना पार्श्वभूमीवर डमरूची मनोहर साथ दिली होती.वाटत होतं की,ते संगीत दगडातून तर येत नाही!नंतर या आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या कलाकारानं मुंबई शहर सोडलं आणि ते नौसारी इथं स्थायिक झाले.त्यानंतर त्यांना मी तिथं भेटायला गेलो होतो,परंतु भेट झाली नाही.पत्रं लिहिली,परंतु पत्राची उत्तरं येत नाहीत.सकाळी भाभीजी मंडईत नियमितपणे

जातात.भाजीपाला,फळं विकत आणतात.पण मी जितके दिवस असेन तितके दिवस रजनीगंधाची फुलं आणायला विसरत नाहीत.रोज मला त्या रजनीगंधाच्या सुगंधी फुलांचा गुच्छ द्यायला विसरत नाहीत.मुंबईहून परत जायच्या दिवशी तर मला रजनीगंधाचा मोठा गुच्छ भेट म्हणून देतात.ती फुलं नवेगावपर्यंत मी सांभाळून आणतो.

साऱ्या प्रवासात त्या फुलांचा गंध साथ करीत असतो.शेवटी मी नवेगावबांधावरील माझ्या निवासस्थानासमोर रजनीगंधाच्या फुलांचा ताटवा लावला,रोज ती फुलं फुलतात.साऱ्या आसमंतात त्यांचा सुवास दरवळत असतो.ती फुललेली फुलं पाहिली की भाभीजींची आठवण होते.एखाद्या जपानी बाहुलीसारख्या त्या माझ्या दृष्टीसमोर दिसू लागतात.म्हणतात कशा,

"भाईसाब,आजकाल तुम्ही मुंबईला आमच्याकडं येत नाही?" खरं आहे तिचं.आता मुंबईत माझं फारसं जाणं होत नाही. आता त्यांचा मुलगा मोठा झालाय.घरात सून आलीय.त्यांना देखील आता मुलंबाळं झालीत, घर लहान झालं.ह्या भरल्या घरात पाहुणा म्हणून जायला मलाच संकोच होतो.पण मुंबईत गेलो, तर त्यांना भेटल्याशिवाय राहत नाही.असंच कधीतरी अवेळी त्यांच्या घराची घंटा वाजवितो. भाभीजी दार उघडायला येतात.आता खूप थकल्या आहेत.डायनिंग टेबलाजवळ बसून त्यांच्याबरोबर गप्पा मारतो.तेवढ्यात भोपळ्याचं थालिपीठ तयार करून ते भाभीजी लोण्याबरोबर एका थाळीत देतात.त्यांना माहीत आहे. हॉटेलमध्ये खात नसल्यानं मी सकाळपासून उपाशी असणार! तिच्या हातचं ते अंगठ्या एवढं जाड,

गरम थालिपीठ खाताना मला अन्नपूर्णची आठवण होते.आता रजनीगंधाची फुलं पाहिली की,त्या वृद्ध पति-पत्नीची आठवण होते.खरेदी केलेल्या एका एका ग्रंथाची आठवण होते.त्या ग्रंथात खुणेसाठी मी रजनीगंधाची फुलं ठेवली आहेत.त्या ग्रंथालादेखील फुलांचा वास लागला आहे.लौकिक दृष्टीनं माझं तिचं कसलंही नातं नाही.पण मनात येतं पूर्वसंचित असेल,तर प्रार्थना करीन की,मी पुत्र म्हणून तिच्या पोटी जन्माला यावं.