* विजय गायकवाड | Vijay Gaikawad

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

१६/५/२४

कृत्रिम निर्मितीचे विश्व A universe of artificial creation

अनेक पशु-पक्षी कृत्रिम वस्तू घडवतात.मुंग्या-वाळव्यांची वारुळे,कागदमाशांची कागदाची,मधमाशांची मेणाची पोळी,बीव्हर ह्या उंदरांच्या जंगी भाईबंदांचे पाण्यात बांधलेले बांध,सुगरिणीची डौलदार घरटी.सामान्यतः ह्या कृत्रिम निर्मिती उपजत प्रेरणांतून ठरलेल्या साच्यांतल्या रचना असतात.पण कोणी,कोणी त्यांतही आपली काही तरी खासियत,सौंदर्यदृष्टी दाखवतात.ह्याचे उत्कृष्ट उदाहरण आहे न्यू गिनीतले कुंजविहारी - बॉवरबर्ड.ह्या पक्ष्यांचे नर रानात जमिनीवर आपले घरटे थाटतात आणि त्याला आकर्षक करण्यासाठी रंगीत गोटे,शंख - शिंपले,

पिसे अशा नानाविध शोभेच्या वस्तूंनी सजवतात.हे मोठ्या चुषीने करतात आणि ह्यातही काही फॅशनी सुरू होतात.

ह्या फॅशनींचा अभ्यास करण्यासाठी शास्त्रज्ञांनी त्यांना वेगवेगळ्या रंगांच्या चकचकीत कचकडी चकत्या पुरवल्या.मग एका दरीत जांभळ्या चकत्यांची फॅशन सुरू झाली.सगळे नर जांभळ्याच चकत्या वापरायला लागले,

तर दुसऱ्या दरीत गुलाबी चकत्यांची चलती सुरू झाली !


प्राण्यांचे कृत्रिम वस्तुविश्व तसे अगदी मर्यादित आहे.माणसाने मात्र त्याला अगडबंब बनवले आहे.

मानव कार्यकारणसंबंध लक्षात घेऊन, विचारपूर्वक अनेक कृत्रिम वस्तू अथवा निर्मुके घडवून त्यांना हरत-तऱ्हेची उपकरणे,आयुधे म्हणून वापरतो.म्हणून एका बाजूने मानवाच्या संकल्पना,त्याचे ज्ञान विकसित होत राहते,तर ह्या स्मरुकविश्वाशी हातात हात मिळवून कृत्रिम वस्तूंचे विश्वही समृद्ध होत राहते.जनुक व स्मरुकांप्रमाणेच निर्मुकांच्याही नकला केल्या जातात.अशा नकला करताना त्यांच्यात बदल घडवले जातात.त्यातून नवनिर्मिती होत राहते.जीवसृष्टी व कल्पसृष्टीप्रमाणेच ही निर्मुकांची, आयुधांची सृष्टीही सतत वर्धिष्णु, नवनवोन्मेषशालिनी भासते.पृथ्वीचा जन्म झाला एका शिलावरणाच्या रूपात.मग ह्या शिलावरणाला पाण्याच्या

जलावरणाने व वायूच्या वातावरणाने झाकले. जिथे शिलावरण - जलावरण - वातावरण एकत्र येतात त्या परिसरात जीवसृष्टी पसरत जाऊन तिचे एक जीवावरण निर्माण झाले.मग प्राणिसृष्टीच्या आणि प्रामुख्याने मानव जातीच्या उत्पत्तीनंतर स्मरुकांची भरभराट होऊन एका बोधावरणाने आणि त्याच्याच जोडीला निर्मुकांची भरभराट होऊन एका आयुधावरणाने पृथ्वी आच्छादली आहे.माहिती व सदेश तंत्रज्ञानाच्या आजच्या झपाट्याच्या प्रगतीने जे एक संगणक - दूरसंदेश ही निर्मुके व संबंधित सॉफ्टवेअरची स्मरुके ह्यांच्या युतीतून सायबरस्पेसमधील विश्व साकारते आहे ते ह्याच उत्क्रान्तीचा अगदी अलीकडचा आविष्कार आहे.


सॅम्युएल बटलरचे एरेव्हॉन


चार्ल्स डार्विनने जीवसृष्टीच्या पातळीवर उत्क्रान्तितत्त्वाची मांडणी करताच त्याच्या सॅम्युएल बटलर ह्या समकालीन प्रतिभाशाली कादंबरीकाराला सुचले की मानव निर्मित कृत्रिम वस्तूही अशाच उत्क्रान्तिपथावर आहेत,आणि ह्यातूनही पुढे काय होईल ह्याचा विचार करणे अत्यावश्यक आहे.असा कल्पनेचा खेळ करत त्याने १८७२ साली 'एरेव्हॉन' नावाची एक कादंबरी लिहिली.

त्या वेळी युरोपीय दक्षिण अमेरिका खंड हळूहळू व्यापत होते.ह्या खंडात एका दुर्गम्य गिरिप्रदेशात एरेव्हॉन ह्या देशात ह्या कादंबरीचा नायक वाट चुकून पोचतो.ह्या देशात काही दशकांपूर्वी यंत्रांची पुढील प्रगती पूर्णपणे रोखायची असा निर्णय घेतला गेलेला असतो. ह्या निर्णयामागचे तत्त्वविवेचन हा ह्या कादंबरीचा गाभा आहे.त्यातील काही उतारे :


◆आम्ही यांत्रिक जीव,यंत्रांचे राज्य आणि यंत्रसृष्टी असे शब्द जाणूनबुजून वापरतो,कारण जशी वनस्पतिसृष्टी खनिजसृष्टीतून निर्माण झाली आणि त्यातून यथावकाश प्राणिसृष्टीची उत्क्रान्ती झाली,तशीच गेल्या काही तपांत एक नवीच सृष्टी आपल्यापुढे प्रगटली आहे.ह्या सृष्टीचे काही अप्रगत प्रतिनिधीच अजूनपर्यंत आपल्या डोळ्यासमोर आले आहेत.


◆आज ह्या यंत्रसृष्टीचा आपला समज फारच अपुरा आहे.अजून आपण ह्यांचे वेगवेगळे वंश,कुळे,प्रजातु,वाण ह्यांच्यात नेटके वर्गीकरण करू शकत नाही किंवा गुणवैशिष्ट्यांच्या यंत्रांतले दुवे समजू शकत नाही.हे तर उघड आहे की वनस्पतिसृष्टीत व प्राणिसृष्टीत नानाविध जशी नैसर्गिक निवड होते तशीच मानवाला यंत्रांचा कसा उपयोग होतो याची निवड समितीत उत्क्रान्ती घडवते आहे,पण ह्या उत्क्रान्तीची नक्की दिशा अजून आपल्याला समजलेली नाही.


◆आपण खूपदा मानवानंतर पृथ्वीवर कोणत्या प्रकारच्या प्राण्याचे वर्चस्व प्रस्थापित होईल ह्याची चर्चा करत राहतो.

पण खरे तर आपणच आपले वारस घडवतो आहोत.

आपण रोज त्यांचे साँदर्य,त्यांच्या रचनेतल्या खुब्या,त्यांची शक्ती जोपासत आहोत हळूहळू त्यांच्यात स्वत:चे नियंत्रण करण्याची,स्वतःच्या कामकाजाची दिशा ठरवण्याची शक्तीही वाढते आहे.ही यंत्रांची स्वयंचलनाची,

स्वनियंत्रणाची शक्ती मानवाच्या बुद्धीची जागा घेत आहे.


◆काळाच्या ओघात यंत्रांपुढे मानवच खालच्या पातळीचा प्राणी ठरेल.दुर्बल,स्वतःवर काबू ठेवू न शकणारा मानव यंत्रांनाच सर्वगुणसंपन्न मानू लागेल.यंत्रांच्या विश्वात क्रोध,लोभ,मद,मोह,मत्सरांचा शिरकाव होणार नाही;त्यांना पाप,शरम आणि दुःख ठाऊक नसेल.ती नितांत स्थितप्रज्ञ असतील.


हे घडले की आज घोड्याचे किंवा कुत्र्याचे व मानवाचे जे नाते आहे,तेच नाते मानवात आणि यंत्रांत प्रस्थापित होईल.कदाचित यंत्रांनी माणसाळलेला मानव आजच्या रासवट मानवाहूत सुखाने जगू लागेल.जसे आपण घोड्या-कुत्र्यांना प्रेमाने सांभाळतो,तशीच यंत्रे मानवाला मायेने पाळतील.


◆आपण भोगवादी दृष्टिकोनातून म्हणू शकू की जेव्हा जेव्हा यंत्रांचा उपयोग आपल्याला लाभदायक आहे,तेव्हा तेव्हा तसा वापर करणे शहाणपणाचे आहे.पण ही तर यंत्रांची हुषारी आहे;आपली सेवा करत करत ती आपल्यावर हुकमत गाजवू लागली आहेत.मानवाने दुसरी अधिक गुणवान कुळी निर्माण करत एका कुळीचा निःपात केला तर त्यांना काहीच दुःख नाही.उलट त्यांना विकासाच्या वाटेने पुढे नेण्याबद्दल ती मानवाला शाबासकीच देतात. त्यांच्याकडे दुर्लक्ष केले,त्यांना सुधारण्यासाठी सारखे झटत राहिले नाही तर मात्र ती रागावतात.पण आपण खरे तर हेच केले पाहिजे. यंत्रांच्या उत्क्रान्तीच्या आजच्या प्राथमिक अवस्थेत ह्यातून आपल्याला खूप त्रास सोसावा लागेल,पण आपण जर आज यंत्रांविरुद्ध बंड पुकारले नाही तर भविष्यकाळात मानवाला आणखीच दारुण यातना सोसाव्या लागतील.पण काळाच्या ओघात यंत्रे ह्या जगावर आपली पकड अधिकाधिक बळकट करत राहतील हे तर निःसंशय.तेव्हा आज एकच मार्ग शहाणपणाचा आहे:मानवाच्या भवितव्याची चाड असणाऱ्यांनी तातडीने सगळ्या यंत्रांविरुद्ध जिंकू किंवा मरू असे युद्ध पुकारावे.ह्यात कोणतेही अपवाद नकोत.

आपण थेट आदिमानवाच्या पातळीवर पोचायची आवश्यकता आहे.जर आज मानवाला हे शक्य नाही असे कोणी म्हणत असेल तर त्यातून आपली किती अधोगती झाली आहे.आपणच निर्माण केलेली यंत्रकुळी नष्ट करणे कसे आपल्या हाताबाहेर गेले आहे,आपण कशी गुलामगिरी पत्करली आहे,हेच सिद्ध होते


आदिमानव..


रानकुत्रे,तरस टोळीने शिकार करताना आपल्याहून आकाराने खूप मोठ्या पशुंनाही सावज बनवतात.

माकडे,वांदरे हिंस्र पशूपासून बचाव करण्यासाठी एकमेकांना धोक्याच्या सूचनां देतात.मानवी कंपू सामूहिक प्रतिकारही करतात आणि शिकारही.चिंपांझी असेच आहेत. व्हेव्हेंट माकडाची शिकार करताना सावज पळत जाऊन झाडावर उंच जाऊन बसले,तर चिंपांझी ते कोणत्या कोणत्या झाडांवर उडी मारत जाऊन तेथून खाली उतरून निसटू शकेल ह्याचा आजमासच घेतात.मग अशा सगळ्या वाटा रोखण्यासाठी त्या त्या झाडांच्या बुंध्यांशी जाऊन उभे राहतात आणि त्यांच्यातला एक वर चढून सावजाला हुसकावतो.मनुष्यप्राणी अशी व्यूहरचना करून शिकार करण्यात आणखी खूपच पुढे गेला आहे.काही ठिकाणी उभ्या कड्यांखाली मॅमथसारख्या हत्तीच्या भाऊबंदांची चिक्कार हाडे सापडली आहेत.

शिकारी टोळ्या ह्या महाकाय पशूना हुशारीने कड्यांकडे पळवत आणून कडेलोट घडवून आणायच्या.मग सावकाश खाली उतरून मांसावर ताव मारायच्या अशी कल्पना आहे.( 'वारुळ पुराण',माधव गाडगीळ',

ई.ओ.विल्सन,अनुवाद - नंदा खरे,मनोविकास प्रकाशन ) प्राण्यांचे संदेश सामान्यतः आता व इथल्या मर्यादांना घुटमळत असतात. पण मानवी भाषा यांना पार करून भविष्यात किंवा भूतकाळात आणि अगदी दूरसुद्धा काय घडते आहे किंवा घडू शकेल ह्याचा ऊहापोह करते.

कदाचित मॅमथ कड्यावरून कोसळून कुठे पडताहेत हे बिलकूल दिसत नसेल,तिथे पोचायला दोन दिवस लागणार असतील,तरी त्याची चर्चा करून हाका केला जात असेल.असे हाके करायला अनेक जण हवेत.टोळक्या-टोळक्यांनी अशा मोठ्या सावजांच्या शिकारी करत - करत माणसाची सामाजिक जडण-घडण झाली असावी.आफ्रिकेच्या शुष्क माळरानांवर, दोन पायांवर पळत,हाताचा वापर करत, गारगोट्यांची,हाडांची हत्यारे वापरत आपले पूर्वज सर्व जीवसृष्टीवर कुरघोडी करण्यात यशस्वी झाले असे दिसते.आरंभी मनुष्यप्राणी निसर्गप्रणालींशी,जलचक्रांशी जुळवून घेत एका साध्या सोप्या जीवनाला आकार देत होता.तो टोळी-टोळीने आफ्रिकेच्या माळरानांवर भटकत फळे,कंदमुळे,खेकडे,

शंख-शिंपले गोळा करत, शिवाय छोट्या- मोठ्या सावजांची शिकार करणारा एक प्राणी होता.इतर पशूहून अवजारे वापरण्यात व आगीवर काबू ठेवण्यात काकणभर सरस होता एवढेच.आगीवरील नियंत्रण तर आधुनिक मानवजातीच्या उत्पत्तीआधीच,सुमारे चार लक्ष वर्षांपूर्वीपासून सुरू झाले असा अंदाज आहे. दीड-दोन लाख वर्षांपूर्वी आधुनिक मनुष्यजातीने पृथ्वीवर पदार्पण केले.पण मानवजातीच्या स्मरुक-निर्मुकांच्या विश्वात भराभर प्रगती होण्याच्या प्रक्रियेची सुरुवात झाली पन्नास- साठ हजार वर्षांपासून.ह्या सुमारास माणूस आजच्या धर्तीची समृद्ध भाषा वापरायला लागला असावा. या कालापासून मानवसमाज दगड- हाड - लाकडांची उपयुक्त उपकरणे बनवण्यासोबत शंख-शिंपल्यांचे दागिने बनवू लागला असावा, छोट्या छोट्या मूर्ती घडवू लागला असावा,प्रेते पुरू लागला असावा.ह्याच वेळी मानव समूहांनी गोष्टी रचायला,गायला,नाचायला आरंभ केला असावा.ह्या माध्यमांतून निसर्गप्रणालीचे, ऋतुचक्राचे,शिकारीच्या डावपेचांचे ज्ञान संकलित करायला,त्यात सतत भर घालायला सुरुवात केली असावी.ह्या साऱ्या कृतींतून माणसांच्या वेगवेगळ्या टोळ्या,निरनिराळे समूह आपापल्या परिसराला समर्पक असे ज्ञान, अनुरूप अशी तंत्रे विकसित करू लागले असावेत.कारण ह्या कालानंतर मानवसमूह खूप विस्तृत अशा भौगोलिक परिसरात, आफ्रिकेबाहेरच्या आशिया,

युरोप,ऑस्ट्रेलिया खंडांत पसरायला आरंभ झाला.हे समूह नदीकिनारे,समुद्रतट,डोंगरपठारे,शुष्क माळराने, घनदाट जंगले,प्रवाळांची बेटे अशा वेगवेगळ्या अधिवासांत राहू लागले.नानाविध परिसरांशी जुळवून घेत ते आपापली वैशिष्ट्यपूर्ण अशी संस्कृती घडवू लागले.जीवसृष्टीच्या वैविध्याला मानवी संस्कृतींच्या वैविध्याची जोड मिळू लागली.या साऱ्या उलाढालींतून मानवाने आज जड,तसेच चेतन सृष्टीवरची आपली पकड घट्ट केली आहे.ह्याचा आरंभ लाखो वर्षांपूर्वी आगीवरील नियंत्रणातून,नंतर काही दशसहस्र वर्षांपासून हाडे,दगड,लाकडाची अधिकाधिक प्रगत आयुधे बनवण्यातून झाला.मग टप्प्याटप्प्याने गेल्या काही हजार वर्षांपासून धातूंचे उत्पादन सुरू झाले.नवनव्या रसायनांची, पदार्थांची निर्मिती केली गेली.घरे उभारली गेली, नद्यांना पाट काढले गेले,बंधारे,धरणे बांधली गेले.जोडीने मानवाने विरजणातल्या जिवाणूंपासून तूर,भात,रेशमाचे किडे,रोहू- कटलांसारखे मासे,कोंबड्या,गायी,घोडे इथपर्यंत विविध जीवजाती आपल्या काबूत आणल्या. 


आज मानवी नियंत्रण जीवांच्या शरीरातील रेणूंच्या पातळीवर पोचले आहे.आपण जिवाणूंतले जनुक उचलून कपाशीत भरतो आहोत.असेच नवे जनुक ठासलेले मासेही निर्माण करत आहोत.सध्या भूतलावरील एकूण जैविक उत्पादनातील अर्धे उत्पादन एकटा माणूस,कोटी जीवजातींतील केवळ एक जात,पटकावतो आहे.

१४/५/२४

थोडसं वेगळं A little different

अलक..१

आईच्या नावे असलेली जागा आपल्या नावावर करून घेण्याची सुप्त इच्छा मनात धरून आईच्या ताब्यासाठी दोन भाऊ भांडत होते.आईला विचारल्यावर ती म्हणाली जो माझ्या औषधाच्या गोळ्यांची नावे एका झटक्यात सांगेल त्याच्याकड़े मी जाईन.दोन्ही भाऊ खजील झाले.

अलक..२.

शिक्षणासाठी दूर देशी गेलेल्या गरीब होतकरु मुलाने आईला पत्र पाठवले त्यात त्याने लिहिले,इथे माझी जेवणाची चंगळ आहे.

काळजी करु नकोस.आईने ते पत्र वाचून एक वेळेचे जेवण सोडले कारण पत्राच्या शेवटी मुलाच्या अश्रुने शाई फुटली होती.

अलक..३.

आजोबाच्या काठीला हाताने ओढत नेणाऱ्या नातीला पाहून लोक म्हणाले,अग हळू हळू आजोबा पडतील ना.आजोबा हसून म्हणाले,पड़ींन बरा,माझ्याजवळ दोन काठया असताना.

अलक..४.

आंब्याच्या झाडावर चढून चोरुन आंबे काढणाऱ्या मुलांच्या पाठीत रखवाल दाराने काठी घातली आणि थोडा वेळ धाक म्हणून त्यांना झाडाला बांधून ठेवले.का कुणास ठाऊक पण त्यानंतर त्या झाडाला कधीच मोहर आला नाही.

अलक..५.

ऑफीसातून दमून आल्यावर बाबाने आजीचे पाय चेपून दिल्याचे पाहून नातीने न सांगता बाबाच्या पाठीला तेल लावून दिल्याचे पाहून आजी म्हणाली,ताटातील वाटीत आणि वाटीतलं ताटात.

अलक..६.

वडील गेल्यावर भावांनी संपत्तीची वाटणी केल्यावर म्हाता-या आईला आपल्या घरी नेताना बहीण म्हणाली,मी खुप भाग्यवान,माझ्या वाटयाला तर आयुष्य आलं.

अलक..७.

काल माझा लेक मला म्हणाला बाबा मी तुला सोडून कधीच कुठे जाणार नाही कारण तू पण आजी आजोबांना सोडून कधी राहिला नाहीस.मला एकदम वडिलोपार्जित प्रॉपर्टी नावावर झाल्यासारखे फीलिंग आले.

अलक...८.

खूप दिवसांनी माहेरपणाला आलेली नणंद tv सिरीयल पहाता पहाता वहिनी ला म्हणाली वहिनी किती मायेने करता तुम्ही माझे,तर वहिनी म्हणाल्या अहो तुम्ही पण माहेरी समाधानाचे वैभव उपभोगायलाच येता की,सिरीयल मधल्या नणंदेसारखी आईचे कान भरून भांडणे कुठे लावता मग मी तरी काय वेगळे करते.रिमोट ने tv केंव्हाच बंद केला होता.

अलक.. ९.

तिच्या नवऱ्याचा मित्र भेटायला आला आज हॉस्पिटल मध्ये तो खूपच आजारी होता म्हणून.जाताना बळेबळेच ५ हजाराचे पाकीट तिच्या हातात कोंबून गेला,म्हणाला लग्नात आहेर द्यायचाच राहिला होता,माझा दोस्त बरा झाला की छानसी साडी घ्या.त्या पाकिटा पुढे आज सारी प्रेझेंट्स फोल वाटली तिला.

अलक..१०.

आज भेळ खायची खूप इच्छा झाली तिला ऑफिस सुटल्यावर पण घरी जायला उशीर होईल आणि सासूबाईंना देवळात जायचे असते म्हणून मनातली इच्छा मारून धावतपळत घर गाठले तिने, स्वंयपाकखोलीत शिरली तर सासूबाई म्हणाल्या हातपाय धू पटकन भेळ केलीय आज कैरी घालून.खूप दिवस झाले मला खावीशी वाटत होती.

अलक..११.

तिन्हीसांजेला सुमतीबाई देवापाशी जपमाळ घेऊन बसल्या होत्या.तेवढ्यात मुलगा कामावरून आला. पाठोपाठ मोगऱ्याचा सुवास आला.सूनबाईच्या केसात फुलला असेल या विचाराने त्यांनी अजूनच डोळे घट्ट मिटून घेतले.थोड्यावेळाने जप झाल्यावर डोळे उघडून पाहतात तर काय मोगऱ्याची ओंजळभर फुले त्यांच्या बालकृष्णासाठी ओटीत वाट पहात होती.त्यांची कूस अजूनही सुगंधीच होती.देवघरातला खोडकर कान्हा गालात हसत होता.

जगात वाईट नाही.चांगल्या माणसांची संख्या खूप जास्त असल्यामुळे हे जग सुंदर झालं आहे..

ग्राम बोली

कावळे - गाव जेवणात पातळ भाजी वाढण्यासाठी ज्या भांड्याचा वापर करायचे ते भांडे म्हणजे कावळे

कालवण / कोरड्यास – पातळ भाजी

आदण - घट्ट भाजीचा रस्सा त्याला आदण म्हणतात.

कढाण - मटणाचा पातळ रस्सा त्याला कढाण म्हणतात. 

घाटा - हरभर्‍याच्या झाडाला ज्यामध्ये हरभरा तयार होतो त्याला घाटा म्हणतात.

हावळा - हरभरा तयार झाला की शेतातच काट्याकुट्या गोळा करुन त्यात हरभरा भाजून खायचा त्याला हावळा म्हणतात.

कंदुरी - पूर्वी लग्नानंतर किंवा एखादा नवस असेल तर देवाला बकरं कापलं जायचं व ते खाण्यासाठी गावातील लोकांना जेवायला बोलवायचे.बकर्‍याचा कोणताही भाग अथवा त्याची तयार केलेली भाजी घरी आणायची नाही त्याला कंदुरी म्हणतात.

हुरडा - ज्वारी तयार होण्यापूर्वी थोडीशी हिरवट कणसं भाजून ती चोळून त्यातून जे दाणे निघतात ते खायला गोड असतात.त्यास हुरडा म्हणतात. 

आगटी - हुरडा भाजण्यासाठी जमिनीत थोडासा खड्डा खोदून त्यात शेणकूट टाकून कणसं भाजली जातात त्याला आगटी म्हणतात.

कासूटा,काष्टा - पूर्वी सर्रास धोतर नेसलं जायचं. धोतराची गाठ कमरेभोवती बांधल्यानंतर राहिलेल्या धोतराच्या निर्‍या घालून पाठीमागे खोचल्या जायच्या त्याला कासूटा म्हणत आणि हाच प्रकार स्त्रियांनी केला तर त्याला काष्टा म्हणत. 

घोषा - पूर्वी ग्रामीण भागात पाटील किंवा उच्चभ्रू लोकांध्ये ज्या स्त्रिया लग्न होऊन यायच्या त्यांना घोषा पद्धत असायची.म्हणजे घराबाहेर पडण्याचा प्रसंग आलाच तर साडीच्या वरून शेळकट गुंडाळायचे व ते पूर्ण तोंडावर घ्यायचे... शेळकट पातळ असल्यामुळे शेळकटातून बाहेरचे दिसायचे.परंतु चेहरा दिसायचा नाही.शेळकट नसेल तर पदर तोंडावर असा ओढायचा की जेणेकरून चेहरा दिसणार नाही. 

दंड - एखाद्या चुकीच्या कामामुळे शासन आर्थिक दंड करते तो वेगळा.येथे दंड म्हणजे पूर्वी कपड्यांची कमतरता असायची.अशा वेळी स्त्रिया एखादी साडी जुनी झाली तरा त्याचा जीर्ण झालेला भाग कापून काढायचा आणि दुसर्‍या जुन्या साडीचा चांगला भाग काढायचा आणि हे दोन चांगले भाग शिवून एक आडी तयार करायची.याला दंड घातला म्हणायचे. 

धडपा - साडीचा भाग जीर्ण झाला असेल आणि त्याला दंड लावायला दुसरी साडी नसेल तर साडीचा जीर्ण झालेला भाग काढून टाकला जातो व नऊवारीसाडीची सहावारी साडी करून नेसली जाते.त्याला धडपा म्हणतात.

कंबाळ / क्याळ - पूर्वी स्त्रियांच्या नऊवारी साड्या असायच्या त्या नेसताना पोटासमोर साडीच्या निर्‍या पोटावर खोचायच्या त्याचा आकार केळीच्या कंबळासारखा व्हायचा किंवा केळासारखा दिसायचा म्हणून काही भागात त्याला कंबाळ तर काही भागात त्याला क्याळ म्हणायचे. 

दंडकी - म्हणजे आताचा हाफ ओपन शर्ट दंडकीला जाड मांजरपाठाच कापड वापरलं जायचं.त्याला पुढे खालच्या बाजूला दोन मोठे खिसे,आतल्या बाजूला एक मोठा खिसा.तसेच त्याला गळ्याजवळ एक चोरखिसा असायचा. 

बाराबंदी - पूर्वी ग्रामीण भागात शर्ट नसायचा,जाड मांजरपटच्या कापडाचा छोट्या नेहरू शर्टसारखा आकार असायचा,त्याला बटण नसायची,बटणाऐवजी बांधण्यासाठी बंधांचा वापर केला जायचा.तो शर्ट घातल्यानंतर बारा ठिकाणी बांधावा लागायचा म्हणून त्याला बाराबंदी म्हणत.

तिवडा - पूर्वी धान्य मळण्यासाठी खळ्याचा वापर करत.खळ्यात कणसं टाकून त्यावर बैल,म्हैस फिरवली जायची.त्यांना गोल फिरता यावे म्हणून खळ्याच्यामध्ये उभे लाकूड रोवले जायचे त्याला तिवडा म्हणत. 

तिफण,चौफण - पूर्वी शेतात धान्य पेरण्यासाठी कुरीचा (पाबर) वापर करत.पिकामध्ये जास्त अंतर ठेवायचे असेल तर तिफणीचा वापर करत,अंतर कमी ठेवायचे असेल तर चौफणीचा वापर करत.

कुळव,फरांदी - शेतात पेरण्यापूर्वी शेती स्वच्छ करण्यासाठी गवत,कचरा काढण्यासाठी कुळवाचा वापर केला जात असे.जास्त अंतर ठेवून शेती स्वच्छ करायची असेल तर फरांदीचा वापर करत. 

यटाक - कोणतेही औत ओढण्यासाठी शिवाळ/ जू याचा वापर करताना ते जोडण्यासाठी ज्या सोलाचा वापर करत त्याला यटाक म्हणत.

शिवाळ - पूर्वी शेती नांगरण्यासाठी लाकडी,लोखंडी नांगराचा वापर केला जायचा.नांगर ओढण्यासाठी सहा-आठ बैल लागायचे,ते ओढण्यासाठी बैल शिवाळी ला जोडली जायची. 

रहाटगाडगं - पूर्वी शेतीला पाणी देण्यासाठी मोटेचा किंवा रहाटगाडग्याचा वापर केला जायचा. रहाटगाडग्याला छोटे छोटे लोखंडी डबे जोडून गोलाकार फिरवून विहिरीतून पाणी काढलं जायचं त्याला रहाटगाडगं म्हणतात. 

रहाट - पाणी पिण्यासाठी आडातून पाणी काढण्यासाठी रहाटाचा वापर केला जायचा.बादलीला कासरा बांधला जायचा.ती राहाटावरून खाली सोडली जायची.पाण्याने भरली की वर ओढून घ्यायची व जवळ आली की हाताने बाहेर काढून घ्यायचं. 

चाड - शेतात धान्य पेरण्यासाठी चारी नळ्यातून सारखं बी पडावं म्हणून चाड्याचा वापर केला जायचा. 

ठेपा - पूर्वी जनावरांना बांधण्यासाठी लाकडी मेडक्याचा ( Y आकाराचे लाकूड) वापर करून छप्पर तयार केलं जायचं.पावसाळ्यात छप्पर एका बाजूला कलंडले तर ते पडू नये म्हणून लाकूड उभे करून त्याला आधार दिला जायचा त्याला ठेपा म्हणत.

शेकरण - पूर्वी घरं कौलारू होती,तेव्हा पावसाळा सुरू होण्यापूर्वी घर गळू नये म्हणून दरवर्षी कौलं व्यवस्थित लावली जायची त्याला शेकरण म्हणत. 

तुराटी -तुरी बडवून जी काटकं राहायची त्याला तुराटी म्हणतात. याचा उपयोग घर शेकारण्यासाठी केला जायचा. 

काडं - गहू बडवून जी काटकं राहायची त्याला काडं म्हणतात.काडाचाही उपयोग शेकरण्यासाठी केला जात. 

भुसकाट - धान्य मळल्यानंतर जो बारीक भुगा राहतो त्याला भुसकाट म्हणतात.याला जनावरं खातात.

वैरण - ज्वारी,बाजरी काढल्यानंतर जो भाग एका जागी बांधून पेंडी बांधली जायची त्याला वैरण म्हणतात. 

जू - औत,बैलगाडी,कुळव ओढण्यासाठी बैलाच्या खांद्यावर जे आडवं लाकूड ठेवलं जायचं त्याला जू म्हणत. 

साठी - वयाची एक साठी असते आणि दुसरी बैलगाडीची साठी असते या साठीचा उपयोग शेतातील माल,डबा,धान्याची पोती,शेणखत,बाजारचा भाजीपाला वाहण्यासाठी केला जातो.त्याची रचना अशी असते,खाली-वर बावकाडे असतात.खालच्या वरच्या बावकाडाला भोक पाडून लाकडं ताशीव नक्षीदार उभी केली जातात.त्याला करूळ म्हणतात.करूळाच्या वर एक बावकाड असतं त्यामध्ये करूळी फिट केली जातात.ज्यामुळे साठीची उंची वाढते व शेतीचा जास्त माल बसतो.साठीला खाली आडवी लाकडं टाकली जातात.त्याला तरसे म्हणतात.त्यावर फळ्या टाकल्या जातात. ज्यामुळे साठीतला माल वाहतूक करताना खाली पडत नाही. 

बंधूतुल्य कवी अनिल फारणे यांच्याकडून व्हाट्सअप च्या मार्गावरून माझ्यापर्यंत आलेली ही उपयुक्त माहिती.उर्वरित शिल्लक राहिलेली माहिती पुन्हा कधीतरी…


१२/५/२४

जन्म जीवशास्त्राचा Birth Biology

त्याचा मृत्यू झाला!त्यावेळी व्हेसायलियस इतका कफल्लक होता,की एका माणसाला दया येऊन त्यानं व्हेसायलियसच्या अंत्यविधीची व्यवस्था केली.नाही तर व्हेसायलियसच्या मृतदेहाची विल्हेवाट लावून टाकायच्या दृष्टीनं त्याच्या शरीराचे लचके गिधाडांनी तोडून टाकण्यासाठी ते उघड्यावर टाकून द्यायची वेळ आली असती! त्याचा सांगाडा नंतरच्या संशोधकांना वापरता आला असता! वयाच्या पन्नासाव्या वर्षी व्हेसायलियसचा असा अतिशय धक्कादायकरीत्या शेवट झाला!आयुष्यभर धर्मकांडाविरुद्ध भूमिका घेतल्याची शिक्षा म्हणून व्हेसायलियसला जाणूनबुजून या धार्मिक यात्रेला पाठवलं गेलं होतं असं काही जण म्हणायचे.पण नंतर यात काही तथ्य नसल्याचं आढळून आलं. ही खोटी बातमी पाचवा चार्ल्स राजाच्या दरबारी असलेल्या ह्युबर्ट लँग्वेटनं मुद्दामच पसरवली होती.या लँग्वेटचं असंही म्हणणं होतं,की १५६५ साली व्हेसायलियस एका शरीराचं विच्छेदन करत असताना त्या शरीरातलं हृदय अजून सुरूच असल्याचं म्हणजेच तो माणूस अजून जिवंतच असल्याचं लक्षात आलं! हे कळताच राजाचा मुलगा असलेला दुसरा फिलिप्स यानं भडकून व्हेसायलियसला या यात्रेला धाडलं.पण हे सगळं थोतांडच होतं.एकूणच शरीरशास्त्र आणि वैद्यकशास्त्र पुढे नेण्यात व्हेसायलियसचा खूपच मोठा हात होता यात शंकाच नाही.एकाच वर्षी प्रकाशित झालेल्या कोपर्निकसचं

'ऑन द रिव्होल्यूशन ऑफ हेवनली स्फियर्स' आणि व्हेसायलियसचं 'दे ह्युमॅनी कॉर्पोरिस फॅब्रिका' या दोन पुस्तकांना प्रसिद्धी मात्र सारखीच मिळाली नाही.

व्हेसायलिसच्या फॅब्रिकाला त्यातल्या सुंदर चित्रांमुळे लवकर प्रसिद्धी मिळाली.शिवाय,माणसाचं शरीर आतून कसं आहे हा प्रश्न अवकाशात पृथ्वी कशी फिरते या प्रश्नापेक्षा किंचितसा लहान होता.त्यामुळे या पुस्तकावर आणि व्हेसायलियसवर घणाघाती टीका झाली नाही.पण कोपर्निकसच्या संकल्पना आणि पुस्तकातला मजकूर धार्मिक लोकांच्या काही पचनी पडला नाही.


कोपर्निकसला याचा फारच त्रास भोगावा लागला.

थोडक्यात,कोपर्निकसमुळे 'डळमळले भूमंडल' अशी अवस्था झाली होती आणि व्हेसायलिसमुळे 'देवानं निर्माण केलेल्या माणसाच्या निर्मितीमध्ये माणसानंच हस्तक्षेप करायचं पाप' घडलं होतं! जुन्या धार्मिक आणि चुकीच्या मतांचा काळा पडदा दूर सारून विज्ञानाच्या क्षितिजावरचा सूर्योदय हे दोघे महान वैज्ञानिक लोकांना दाखवायचा प्रयत्न करत होते,पण धर्मांधतेची झापडं डोळ्यांवर घट्ट बांधून झोपलेल्या समाजाला जाग यायला अजून काही वैज्ञानिकांची गरज होती.


हे काम गॅब्रिएलो फॅलोपिओ किंवा गॅब्रिएल फैलोपियस (Gabriello Fallopio or Gabriel Fallopius) (१५२३-१५६२) हा व्हेसायलियसचाच शिष्य पुढे नेणार होता। याचा जन्म १५२३ साली झाला होता.त्यानं व्हेसायलियसची प्रयोगात्मक ॲनॅटॉमीची परंपरा पुढे नेली.त्यानं माणसाच्या शरीरातल्या जवळपास सगळ्याच अवयवांचा बारकाईनं अभ्यास केला आणि आजपर्यंत दुर्लक्षित झालेले आकारानं लहान पण फार महत्त्वाचे अवयव शोधून काढले आणि त्यांना स्वतःचं नाव दिलं. (उदा.,फैलोपियन ट्यूब)


सोळाव्या शतकात वैद्यकशास्त्राविषयी मोलाची कामगिरी करणाऱ्या अगदी मोजक्या लोकांपैकी तो एक होता.

व्हेसायलियसचा तो मित्र,सहकारी आणि शिष्यही होता.

इटलीमधल्या मोदेना नावाच्या गावात त्याचा जन्म झाला.

त्याचं कुटुंब गरीब होतं,त्यामुळे फैलोपिओला लहानपणा-

पासूनच कष्ट करायची सवय होती. विलक्षण धडपड करून त्यानं कसंबसं आपलं शिक्षण पूर्ण केलं.नंतर पोट भरण्यासाठी त्याला चर्चमध्ये धार्मिक विधींमध्ये मदत करणाऱ्या क्लर्जीची नोकरी धरावी लागली.१५४२ साली त्याला धर्मगुरूच्या पदावर बढती मिळाली. त्याचबरोबर युरोपमधल्या फेरारामध्ये त्यानं वैद्यकशास्त्राचं शिक्षण पूर्ण केलं.१५४८ साली त्याला एमडी ही पदवीही मिळाली! त्यानंतर त्यानं अनेक वैद्यकीय प्रशिक्षण देणाऱ्या महाविद्यालयांमध्ये शिक्षकाची नोकरी केली आणि फेरारामध्येही ते काम केलं.गिरोलामो फॅब्रिची हा त्याच्या काही गाजलेल्या विद्यार्थ्यांपैकी एक समजला जातो. फॅलोपिओनं त्या काळात अत्यंत मानाच्या समजल्या जाणाऱ्या पिसाच्या विद्यापीठातही प्राध्यापक म्हणून काम केलं.१५५१ साली पडुआ विद्यापीठात शरीरशास्त्र आणि शस्त्रक्रिया या विषयांचा प्रमुख म्हणून काम करण्यासाठी त्याला आमंत्रण आलं.ते त्यानं स्वीकारलं आणि आपल्या मुख्य कामाव्यतिरिक्त तिथल्या वनस्पतिशास्त्र विभागाचा प्रमुख म्हणूनही काम केलं.फॅलोपिओनं स्वतः माणसाच्या डोक्यासंबंधी बरंच संशोधन केलं.आपल्या डोक्याची रचना कशी असते,

त्यातून आपल्याला काय काय आजार होऊ शकतात,

आणि ते कसे बरे करता येतील यावर त्याचा भर असे.

वैद्यकशास्त्रानुसार आपल्या कानाचे सामान्यतः तीन भाग (बाहेरचा, मधला आणि आतला) असतात असं मानलं जातं.फैलोपियसनं त्या काळात आतल्या कानाविषयी असलेल्या माहितीत भर घातली.तसंच मधल्या आणि बाहेरच्या कानाच्या भागांमध्ये असणाऱ्या टिंपॅनिक मेंब्रेन (किंवाढोबळपणे आपल्या कानाचा पडदा) विषयी बरंच संशोधन केलं.तसंच मधल्या कानाच्या रचनेबद्दल त्यानं सखोल अभ्यास करून तिथं असणाऱ्या मॅस्टॉइड सेल्स नावाच्या अवयवाविषयी सर्वप्रथम आपली मतं नोंदवली.


याखेरीज डोळे आणि नाक यांच्यासंबंधीसुद्धा त्यानं मोलाची कामगिरी केली.एकूणच माणसाच्या शरीरातले स्नायू आणि त्यांच्यामधल्या पेशी यांच्याविषयी त्यानं भरपूर अभ्यास करून आपला गुरू व्हेसायलियस याच्याही काही चुका दुरुस्त केल्या.


पुरुष आणि स्त्री या दोघांच्या पुनरुत्पादनाच्या अवयवांच्या अभ्यासानंतर त्यानं स्त्रीच्या शरीरात गर्भाशय आणि अंडाशय यांना जोडणारी एक नळी असल्याचा शोध लावला.त्याच्या या कामगिरीमुळे आज आपण या नळीला 'फॅलोपियन ट्यूब' या नावानं ओळखतो.तसंच आपल्या कानाच्या बाहेरच्या बाजूच्या संवेदना टिपून त्यासंबंधीची माहिती मेंदूला द्यायचं काम करणारा एक ऑडिटरी नर्व्ह नावाचा मज्जातंतू असतो.

तिथून आपल्या चेहऱ्याच्या भागात असणाऱ्या मज्जातंतूंना पुलासारखं जोडणाऱ्या अवयवाचाही शोध त्यानंच लावला.त्यामुळे तिचंही नाव फॅलोपिओच्या गौरवाप्रीत्यर्थ 'ॲक्वाडक्ट्स फॅलोपी' असं पडलं. 


कानाच्या विकारांचं निदान करण्यासाठी विशिष्ट प्रकारचा चिमटा वापरणाराही तो पहिलाच. 


त्यानं शरीरात येणाऱ्या व्रणांविषयी (अल्सर) आणि शरीरात वाढणाऱ्या रोगट पेशींच्या ट्युमरविषयी प्रबंध लिहिले.तसंच त्यानं शस्त्रक्रियांविषयीसुद्धा आपली निरीक्षणं नोंदवली.डोक्याला होणाऱ्या जखमांविषयीच्या हिप्पोक्रॅट्सच्या पुस्तकाचं परीक्षणही त्यानं केलं होतं.

फैलोपियस हा स्त्री-पुरुषांच्या शारीरिक संबंधांतल्या वैद्यकीय बाबींबद्दलचाही तज्ज्ञ समजला जाई.आधी पुरुषाच्या लिंगावर आणि मग सगळ्या शरीरावर पुरळ आणणारा सिफिलिस नावाचा गंभीर गुप्तरोग होऊ नये म्हणून पुरुषानं कंडोम वापरावा ही दूरदृष्टी त्याला त्या काळात होती! यासाठी त्यानं कंडोमच्या काही चाचण्याही घेतल्या असाव्यात असं मानलं जातं.किंबहुना त्यानं लिहून ठेवलंय की यासाठी त्यानं ११०० पुरुषांची चाचणी घेतली आणि त्या सगळ्यांनी शरीरसंबंधाच्या वेळी कंडोम वापरल्यानं एकालाही सिफिलिस झाला नाही! त्याचा कंडोम म्हणजे पुरुषानं लिंगावर सरकवायचं पातळ कापडावर औषध पसरवून वाळवलेलं एक आवरण होतं.त्यावर स्त्रिया भाळाव्यात म्हणून त्याला एक छोटी गुलाबी रिबिन गुंडाळायची रसिकताही फॅलोपिओमध्ये होती!ज्या स्त्रियांचे आधी शारीरिक संबंध आलेले नसतात त्यांच्या योनीमध्ये हायमेन नावाचा एक पडदा असतो हे त्यानंच ठासून सांगितलं आणि योनीचं आज सर्वमान्य असणारं इंग्रजी नाव 'व्हजायना' हेही त्यानंच सुचवलं ! 


१५५६ सालच्या सुमाराला त्याची प्रकृती खालावली.

१५६० साली तो पॅरिसमध्ये एके ठिकाणी डॉक्टर म्हणून काम करण्यासाठी गेला.पण त्याच्या फुफ्फुसांना आलेल्या सुजेमुळे त्याचं निधन झालं.त्याची पॅरिसमधली डॉक्टरची जागा मग त्याचा विद्यार्थी गिरोलामो फॅब्रिची यानं घेतली.याच काळातला बार्टोलोमो युस्ताची (Bartolomeo Eustachi) (१५०० किंवा १५१४-१५७४) हाही गाजलेला शरीरतज्ज्ञ होता. त्याचं लॅटिन भाषेतलं नाव युस्टॅशिओ असं होतं. हा व्हेसायलियसचा विरोधी आणि गेलनचा समर्थक होता.पण तरीही त्यानं स्वतः जेव्हा मानवी शरीराच्या आत डोकावलं तेव्हा त्यानंही जे आपल्याला डोळ्यांनी पाहिलं तेच सांगायचा प्रयत्न केला.युस्टॅशिओ हा मूळचा इटलीतला.त्याला लॅटिन,ग्रीक,आणि अरेबिक भाषा यायच्या.व्हेसायलियस या साथीत त्यानं गेलनच्या अर्धवट माहितीची सद्दी संपवत खऱ्या अर्थानं वैद्यकीय क्षेत्रात अचूक माहितीचं युग आणलं.आपल्या कानाच्या आत असणाऱ्या नळीविषयीचं फॅलोपिओचं संशोधन त्यानं पुढे नेलं आणि त्याचं अचूक शब्दांमध्ये वर्णनही केलं. याआधी या नळ्या अल्केमॉननंही पाहिल्या होत्या.पण हे ज्ञान मागची दोन हजार वर्ष अंधारात राहिल्यामुळे या नळ्यांना आता 'युस्टॅशियन ट्यूब्ज'च म्हटलं जातं.

आपल्या कानाच्या आतल्या भागात असलेल्या कोर्टी नावाच्या अवयवाविषयीही त्यानं पुढचं संशोधन केलं.या अवयवामुळे आपल्याला ऐकू येतं.तसंच आपल्या किडनीच्या वरच्या भागात हार्मोन्स तयार करणाऱ्या ताऱ्यांच्या आकाराच्या ॲड्रेनल ग्लँड्स नावाच्या ग्रंथी असतात. आपल्याला ताणतणावाचा सामना नीट करता यावा म्हणून त्या कॉर्टिसॉल आणि ॲड्रेनॅलिन यांच्यासारखे रसायनं स्त्रवतात.१५६३ साली या ॲड्रेनल ग्लँड्सचा शोध युस्टॅशिओनं लावला. व्हेसेंलियसच्या धर्तीवर त्यानंही माणसाच्या शरीररचनेची रेखाटनं 'ॲनॅटॉमिकल एनग्रोव्हिंग्ज' या नावानं तयार केली होती.

त्यामुळे त्यालाही त्या काळच्या धार्मिक साम्राज्याचा रोष ओढवून घ्यायची भीती वाटत होती.पण त्याच्या जिवंतपणी ही छापणं शक्य झालं नाही.तब्बल दीडशे वर्षांनी ती १७१४ साली प्रसिद्ध झाली! त्यावेळी युस्टॅशिओनं किती मेहनत घेऊन अतिशय अचूकतेनं माणसाच्या शरीरासंबंधीची रेखाटनं तयार केली होती,हे जगाला दीडशे वर्षांनी उमगलं ! पण प्रसिद्ध झाल्यानंतर मात्र हे पुस्तक बेस्टसेलर ठरलं! 


जर धर्माचा पगडा युस्टॅशिओच्या काळात नसता तर माणसाच्या शरीराच्या आतली रहस्य जगाला कळायला अठरावं शतक उजाडायची गरज भासलीच नसती ! 


थोडक्यात,व्हेसायलियस,फॅलोपिओ,युस्टॅशिओ आणि त्या वेळच्या अनेक वैज्ञानिकांनी त्या त्या काळच्या प्रचलित धार्मिक रूढींना घाबरून न जाता मानवी शरीराच्या आत काय आहे हे डोकावून पाहण्याचं धाडस केलं.त्यातूनच आधुनिक विज्ञानाच्या उज्ज्वल युगाची सुरुवात झाली.

ॲनॅटॉमीतूनच आता शरीरक्रिया शास्त्र (फिजिओलॉजी),

शस्त्रक्रिया (सर्जरी) आणि बायॉलॉजीच्या इतरही अनेक शाखांचा जन्म होणार होता.


०६.०४.२४ या लेखातील शेवटचा भाग…