* विजय गायकवाड | Vijay Gaikawad

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

१३/६/२४

घातक..Fatal..

हा प्रसंग आहे जवळपास सात वर्षांपूर्वीचा...! 


भिक्षेकर्‍यांच्या या कामांमध्ये मी नवखा होतो कोणताही अनुभव पाठीशी नव्हता. 


भीक मागणाऱ्या लोकांमध्ये असाच एके दिवशी एका ठिकाणी गेलो असता,तिथे एक पाय नसलेली दिव्यांग ताई बसलेली होती.


माझ्याकडची मोठी बॅग बघून तिला वाटले, मी काहीतरी वाटायला आलोय,कुबड्यांचा आधार घेत धडपडत ती माझ्या जवळ आली आणि माझ्यासमोर तिने हात पसरले. मी डॉक्टर आहे... गोळ्या औषधे देतो... वगैरे वगैरे काहीतरी बोललो.... पण, यानंतर हा आपल्या काही कामाचा नाही असं समजून ती भ्रमनिरास होऊन तिथून निघाली. 


नवखा होतो... ! 


आधी छान नातं तयार करायचं आणि नंतर मगच कुणालातरी सल्ले द्यायचे,हे नंतर अनुभवातून शिकलो; परंतु त्यावेळी हे माहीत नव्हतं.... ! 


याच नवखेपणामधून म्हणालो,'बाई भीक काय मागतेस काम कर की...


व्हायचं तेच झालं... नवशिक्या ड्रायव्हर कडे गाडी दिली की तो कुठेतरी धडकवणारच....


यानंतर भयंकर रागाने ती गर्रकन वळली आणि म्हणाली ए बडे बाप की अवलाद , इधर आके शानपत्ती मत झाड...भरे पेट से किसी को सलाह देना बहुत आसान बात होती है... तेरे घर मे मा होगी,बाप होगा,सब लोग होंगे... तेरेको पाल पोसके बडा किया तो तू डॉक्टर बना... 


मेरे को ना बाप...  ना मा ... दो बच्चे और एक कुबडी मेरी.... इत्ते सहारेसे रस्ते पे औरत होके तु इज्जत संभालके जी के दिखा...!


मी ना कुणी बडा होतो किंवा ना माझा बाप कुणी बडा होता... मी अतिशय सामान्य कुटुंबातला...

अत्यंत मुश्किलीने कसाबसा झालेला डॉक्टर होतो

मी ...! तीला यातलं आता काय काय सांगू  ? 


परंतु ती जे बोलली ते सुद्धा खरं होतं...!


भरल्या पोटानं दिलेला सल्ला उपाशी पोटाला कधीच पचत नाही...! यानंतर ती दिसत राहिली... तिने काम करावं अशी माझी आंतरिक इच्छा होती. 


दरवेळी मी तिला याविषयी सुचवायचो आणि दरवेळी ती माझा पाणउतारा करायची. 


तिच्याशी बोलताना मला जाणवलं,की तिला Artificial Jewellery मध्ये रस आहे, त्याच्या खरेदी विक्री बद्दल ती बरंच काही जाणून होती,हाच धागा पकडून मी तिला म्हणालो,की तू हा व्यवसाय कर,हा व्यवसाय सुरू करण्यासाठी मी तुला लागेल ती मदत करतो. डोळ्यात भीती... चेहऱ्यावर साशंकता... नाकावर राग.... ओठांवर शिवी.... 


अशा संमिश्र भावना घेऊन,शेजारी असलेल्या कुबडीला घट्ट पकडून ती मला म्हणाली, 'इसके बदले मे तेरको क्या चाहिये रे ...?' 


मी सहज म्हणालो,'इसके बदले में चाहिये एक राखी...!' अनेक जणांकडून गोड बोलून, फसवली गेलेली ती ताई ... माझ्या इतक्या मोघम बोललेल्या शब्दांवर ती आता बरी विश्वास ठेवेल ?? 


चल रे... आया बडा... तेरी मा का... xxx 

( तिच्या या "तीन फुल्यांमध्ये" माझी अख्खी आई सामावली होती)


आपलं पद काय ?  प्रतिष्ठा काय ? आपला पगार किती ? आपली इस्टेट किती ? याला काहीही महत्त्व नसतं .... दुसऱ्याच्या मनातल्या "तीन फुल्यांमध्ये " आपण कोण आहोत ? तीच आपली औकात...!  बाकी सर्व मृगजळ...!!!


तर,यानंतर मला तिने चप्पल दाखवली होती,  मला चांगलं आठवतं आणि त्या तीन फुल्या सुद्धा.... मी विसरलो नाही,अजून इतक्या वर्षानंतर सुद्धा...!!!


असो....


या सर्व घटनाक्रमामध्ये ओघाओघानं तीची दोन्ही मुलं मात्र निरागसपणे माझ्याशी जुळली गेली.नकळतपणे मला ती मामा म्हणू लागली... मला हि दोन्ही मुलं खुप आवडायची.... दोघांशी बोलताना जाणवायचं, या मुलांमध्ये काहीतरी "स्पार्क" आहे... 


एक मुलगा कॉम्प्युटर विषयी बोलायचा.... 

एक मुलगा फुटबॉल विषयी बोलायचा... 


हि मुलं कुठून हि माहिती मिळवत असतील? 

हे ज्ञान यांना कुठून येत असेल...??? 


मी खेड्यातला आहे....  

मला जाणवलं,रानफुलांना मशागत लागत नाही,पाणी लागत नाही,खत लागत नाही, ती जगतात निसर्गाच्या किमयेवर... ! 


हि मुलं अगोदर पासून शाळेत जातच होती, परंतु पैशाअभावी कधी शाळा सुटेल हे सांगता येत नव्हतं...आता मला वाटायला लागलं,या बाईचं जाऊ दे... परंतु किमान मुलांचं आयुष्य नको बरबाद व्हायला,यांची शाळा नको सुटायला... 


नुसत्या निसर्गाच्या भरवशावर सोडून उपयोग नाही.... मुलांना योग्य तो मार्ग दाखवायला हवा.... इतकीच माझी ओढ होती.परंतु या ताईच्या परवानगीशिवाय ते शक्य नव्हतं आणि म्हणून मी कायम तिची हांजी हांजी करायचो...!


एके दिवशी तिला म्हणालो 'मुलं,मला मामा म्हणतात,त्यांच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी मी घेतो,तू शेवटपर्यंत त्यांना शिकवशील याचा मला भरवसा नाही.'आता मला आठवत नाही कसं ते... परंतु यावर बराच वेळ विचार करून शेवटी तीने परवानगी दिली होती.या दोन पोरांची तेव्हापासून सर्व शैक्षणिक जबाबदारी आपण घेतली. 


मग,दोन्ही मुलांना माझा फोन नंबर दिला होता,काही अडचण आली तर, कुठून तरी मला संपर्क करा,असं सांगितलं होतं...  यानंतर मी जिथे असेन, तिथे मला मुलं भेटून जात असत,दोन्ही मुलं माझ्या संपर्कात होती...पोरांच्या फिया,युनिफॉर्म,वह्या पुस्तकं आणि लागेल ते सर्व मी देत होतो.... आता पावेतो या ताईचा माझ्यावर विश्वास बसला असावा. 


एके दिवशी,तिने मला घरचा पत्ता दिला आणि म्हणाली, 'दादा घरी ये....!' 


"दादा घरी ये" हि वाक्यें आहेत साधीच परंतु माझ्यासाठी... सुवर्ण मोलाची ..! 


जी बाई रस्त्यात चप्पल दाखवते ... माझ्या आईचा उद्धार करते... तीच परत मला जेव्हा "दादा" म्हणत घरी बोलावते तेव्हा,तेच माझ्यासाठी सीमोल्लंघन असतं.... ! भले भले मोठे लोक मला घरी बोलावतात; पण मी कोणाच्या घरी जात नाही... 


हिचा मात्र;दिलेला पत्ता शोधत;खूप मोठ्या मुश्किलीने मी तिच्या "घरी" पोहोचलो.... 


घर म्हणजे कोणाच्याही नजरेसमोर काय येतं? घराला चार भिंती असतात आणि एक छप्पर असतं...


या घराला ना छप्पर होतं... ना भिंती... पण तरीही ती त्याला घर म्हणत होती...! तिच्या या "घरात" गेल्यानंतर,मला जाणवलं, विटांच्या चार भिंती म्हणजे घर नसतं ....  जी माणसं एकत्र राहत आहेत,अशांनी एकमेकांच्या हातात हात गुंफले की आपोआप नात्यांच्या भक्कम भिंती उभ्या राहतात... दुसरा भिजू नये म्हणून पहिल्याने जे काही मनापासून केलं त्याला छप्पर म्हणतात... ! 


या कुटुंबात येऊन,घराविषयी डोक्यात असलेल्या अनेक संकल्पना बदलल्या...! तिथे जे काही फळकुट ठेवलं होतं,त्या फळकुटावर मी बसलो... 


दोन्ही पोरं येऊन मामा मामा म्हणत मला बिलगली....यानंतर ती ताई आली... तिने मला पेढा भरवला... दोन्ही मुलं खूप छान मार्कांनी पास झाली होती. या दिवशी तीनं मला राखी बांधली.राखीच्या  एका धाग्यानं ती माझ्या आईची मुलगी झाली... ! 


कधीतरी पूर्वी तीनं माझ्या आईचा फुल्याफुल्यांमध्ये उद्धार केला होता... आज या फुल्याफुल्यांची "फुलं" झाली...! यानंतर,मी तीला पुन्हा काम करण्याविषयी सुचवलं. आणि याच दिवसापासून ती आर्टिफिशियल ज्वेलरी चा व्यवसाय करू लागली.आता तिचं भीक मागणं पूर्ण थांबलं. हा माझ्या विजयाचा दिवस होता...! विश्वास बसणार नाही इतकी तिची करुण कहाणी होती... यावर अख्खी एक कादंबरी होईल... असो, तिच्याविषयी पुन्हा कधीतरी...! 


बरोबर तीन वर्षांपूर्वी तीचा मोठा मुलगा अतिशय उत्तम मार्कांनी बारावी पास झाला. त्याच्या आवडीनुसार त्याला कॉम्प्युटर सायन्सला ऍडमिशन घेऊन दिले.आज तो कॉम्प्युटर सायन्सच्या तिसऱ्या वर्षात शिकत आहे.पहिल्या दोन्ही वर्षात तो फर्स्ट क्लासने पास झाला.याच्या संघर्षाविषयी बरंच काही मांडायचं आहे... परंतु याच्या विषयी सुद्धा पुन्हा कधीतरी...! आज मला सांगायचं आहे ते धाकट्या विषयी...! शाळेत असताना "तो" अतिशय उत्तम फुटबॉल खेळायचा.शाळेतल्या प्रत्येक मुलाकडे फुटबॉलचे उत्तम क्वालिटीचे शूज (स्टड) होते,हा मात्र अनवाणी पायांना खेळायचा.तरीही फुटबॉल या खेळातला तो हिरो होता,नव्हे हिरा होता.


यानंतर जिल्हास्तरीय आंतरशालेय फुटबॉल स्पर्धा भरल्या... निवड चाचणी झाली... अर्थातच याने अनवाणी पायाने का असेना, पण अप्रतिम खेळ करून दाखवला... 


खरंतर टीमचा कप्तान होण्याची पात्रता याची... तरीही स्पर्धेमध्ये याची निवड झाली नाही... कारण होते -  तुझ्याकडे फुटबॉलचे स्टड नाहीत... स्पर्धेमध्ये नियमानुसार तुला अनवाणी खेळता येणार नाही...! 


तिथल्या स्पोर्ट्स टीचरच्या त्याने विनवण्या केल्या,परंतु त्यांनी नियमावर बोट ठेवले.मग पात्रता असूनही स्पर्धेत तो खेळू शकला नाही. 


यानंतर मला तो भेटायला आला,या चिमुकल्याच्या डोळ्यात अंगार होता, हाताच्या मुठी तो बाजूच्या भिंतीवर आपटत होता... एकूणच सिस्टीम विषयी तो भयंकर रागानं बोलत होता... बोलता बोलता तो हमसून रडायला लागला...


आपल्याच शाळेचा एक खेळाडू पुढे जाऊन आपल्याच शाळेचे नाव उज्वल करणार असेल तर शाळेने एक स्टड आपल्याच खेळाडूला घेऊन द्यायला काय हरकत होती ? 


पण नाही,नियम म्हणजे नियम...व्वा !!! 


मलाही या सर्व प्रकाराची चीड आली.पण या मुलाला सावरणं आवश्यक होतं...! 


"घातक" या चित्रपटामध्ये,अमरीश पुरी आणि सनी देओल यांच्यात एक अत्यंत भावुक प्रसंग आहे.त्यात बाप आपल्या मुलाला सांगतो,'अपने क्रोध को पालना सीखो काशी,इसे जाया मत करो.'


आपल्याला आलेला राग आदळ आपट करून त्यावेळी वाया जाऊ द्यायचा नाही, त्याला जपून ठेवायचं,याच रागाला एक हत्यार बनवायचं,पण या हत्यारानं कुणाला इजा करायची नाही,स्वतःला  आकार देण्यासाठी या हत्याराचा योग्य वेळी उपयोग करायचा.रागाचं हे हत्यार वापरायचं,  काहितरी चांगलं "घडवण्यासाठी"... काही "बिघडवण्यासाठी" नव्हे... !!! मोबाईलवर शोधून हा प्रसंग त्याला पाहायला दिला. त्याला ते कितपत पटलं,किती रुचलं,मला माहित नाही,पण तिथून तो शांतपणे निघून गेला. मला खूप वाईट वाटलं...! 


"लायक" असतानाही "नालायक" ठरवलं; की त्याच्या वेदना किती होतात याची मला जाणीव आहे.


अमेरिकेत स्थायिक असलेले माझे एक मित्र, ते स्वतःस्पोर्ट्स मॅन आहेत.व्हॉट्स ॲपवर असाच त्यांच्याशी काहीतरी संवाद साधत असताना त्यांच्याशी मी हा प्रसंग शेअर केला. 


यानंतर माझ्या काहीही ध्यानी मनी नसताना, मला एक पार्सल मिळाले,त्यात अतिशय उच्च क्वालिटीचे स्टड होते,बिलावरची किंमत डॉलर मध्ये होती... भारतीय रुपया नुसार त्याची किंमत 35 हजार रुपये इतकी असावी. 


मी भारावून गेलो. 


दुसऱ्याची वेदना कळली,की मगच संवेदना जन्माला येते... दुसऱ्याची वेदना आपण जगायला सुरुवात करतो,त्यावेळी ती समवेदना होते...! 


अमेरिकेत बसून एका चिमुकल्याची वेदना तिकडे ते जगत होते...अमेरिकेतील त्या स्नेह्यांना मी मनोमन नमस्कार केला. 


यानंतर त्या मुलाला बोलावून त्याच्या हातात स्टड दिले... स्टड पाहून त्याचे डोळे चमकले.. त्याच्या डोळ्यात मग एकाच वेळी मला चंद्र आणि सूर्य शेजारी शेजारी बसलेले भासले...! 


संपूर्ण शाळेत आता त्याच्या इतके भारी स्टड कोणाकडेही नव्हते. 


अर्थातच पुढे या मुलाची निवड झाली... गुणवत्तेपेक्षा इतर बाबींवर फोकस केल्यामुळे याची निवड होण्यास वेळ लागला पण हरकत नाही... देर सही - दुरुस्त सही...!  या एका पायताणानं त्याला मात्र कुठल्या कुठं पोहोचवलं...!  फक्त जिल्हास्तरीय नव्हे,तर राज्यस्तरीय पातळीवर फुटबॉल मध्ये हा चमकू लागला. मला याचा अभिमान होता.योग्य वेळी योग्य मुलावर समाजाच्या माध्यमातून आपण याला मदत करू शकलो याचा आत्मिक आनंद होता. 


यानंतर दहावी उत्तम मार्काने पास करून याला अकरावीत ऍडमिशन घेऊन दिले... पुढे हा बारावीत गेला... अभ्यासाबरोबर फुटबॉल ची घोडदौड जोरात सुरू होतीच.८ जून २०२४, वार शनिवार,एका मारुती मंदिराच्या बाहेर भिक्षेकऱ्यांना मी तपासात असताना कोणीतरी पाठीमागून आले आणि माझ्या तोंडात पेढा भरवला. मी वळून पाहिलं तर हा मुलगा होता... सोबत त्याची आई म्हणजे आमची ताई...! 


ती एका पायावर उभी होती,हातात कुबडी नव्हती...

तिचा हात तिच्या मुलाच्या खांद्यावर होता... त्याच्या आधाराने ती उभी होती... जणू मुलगाच तिचा दुसरा पाय झाला होता...!  हा प्रसंग मी नजरेने टिपला आणि मनात जपून ठेवला. तोंडात पेढा असल्यामुळे मुलाला मी खुणेनं विचारलं,पेढे कसले ? 


तो अत्यंत आनंदानं बोलला ; सर,मी बारावी पास झालो,६७ टक्के मार्क पडले. मी झटक्यात उठून उभा राहीलो... माझ्या त्या पोराला मी मिठी मारली... सर्व भूतकाळ मला चित्रपटातल्या प्रसंगाप्रमाणे आठवला.

या एका मिठीमध्ये आमच्या अश्रूंची अदलाबदल झाली... माझे अश्रू त्याच्या खांद्यावर आणि त्याचे अश्रू माझ्या खांद्यावर... इकडे अश्रू आमच्या डोळ्यात होते आणि तिकडे पदर त्या माऊलीने डोळ्याला लावला...


एका मिठी ने काय जादू केली...!!! 


आनंदाचा हा भर ओसरल्यावर मी त्याला म्हणालो,'चला आता पुढे काय करायचं...?' 


तो मला म्हणाला सर आता मला,भारती विद्यापीठ मध्ये BPES ला ऍडमिशन घ्यायचे आहे... 


BPES म्हणजे काय मला नेमकं कळलं नाही... पण माझीही कामं खोळंबली होती... मी गडबडीत त्याला म्हणालो,'ठीक आहे... ठीक आहे... तुला जे काही करायचं आहे, त्याबद्दल मला लिहून एक अर्ज दे... तोपर्यंत मी माझी कामं उरकून घेतो...' माझी काम होईपर्यंत तो अर्ज घेऊन आला. अर्ज पाहून मी चमकलो... अर्ज अस्खलित इंग्लिश मध्ये होता...


My dear Dr. Sonawane sir, 

SOHAM Trust,Pune


अशी सुरुवात होती... इंग्लिश मध्येच त्याने पहिल्या पॅरेग्राफ मध्ये स्वतःची परिस्थिती, शिकायची इच्छा वगैरे याविषयी लिहिलं होतं. 


दुसऱ्या पॅरेग्राफ मध्ये लिहिलं होतं


I wish to continue my further education with your kind support. 


I want to take admission for the *BPES course (Bachelor of Physical Education and Sports)*


My ultimate goal is to become a Sports Teacher... I will apply all my abilities to uplift poor children to make them good sports man and....


पुढचं मी वाचूच शकलो नाही... डोळ्यातल्या पाण्याने अक्षर धुसर केली...! एकतर अर्ज इंग्लिश मध्ये...तो ही इतका मुद्देसूद... बारावी काठावर पास झालेला मी मला आठवलो...तेव्हा आपल्याला इतकी अक्कल होती का ??? हे पोरगं खरंच मोठं झालं होतं...किंवा परिस्थितीने केलं होतं...! 


सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा,की त्याला स्पोर्ट्स टीचर व्हायचं होतं...! मी त्याला म्हणालो,'स्पोर्ट्स टीचर का रे ? इतर कितीतरी अनेक ऑप्शन आहेत तुला.'


तो भूतकाळात हरवला... इतका वेळ उभा असलेला तो आता माझ्या शेजारी बसला... आणि डोळ्यातलं पाणी लपवत तो म्हणाला, 'सर तुम्हाला आठवते का ?  काही वर्षांपूर्वी घातक पिक्चर मधला प्रसंग तुम्ही मला मोबाईलवर दाखवला होता.त्यात बाप आपल्या मुलाला सांगतो,'अपने क्रोध को पालना सीखो काशी,इसे जाया मत करो.'


मी तोच काशी होण्याचा प्रयत्न केला सर...!  


म्हणजे ? मला कळलं नाही...! 


सर,'भीक मागणारी अपंग आई,अंगात पात्रता असून सुद्धा केवळ गरिबीमुळे सर्व गोष्टींपासून वंचित राहिलेला मी,कोणाच्या घरात कोणी जन्म घ्यावा हे कोणाच्याही हातात नसतं... केवळ भीक मागणाऱ्या कुटुंबामध्ये झालेल्या माझा जन्म आणि यामुळे कायम वाट्याला आलेली अवहेलना... या सर्व बाबींमुळे मला भयंकर राग यायचा... राग कसा व्यक्त करायचा हे मात्र कळायचं नाही... वाटायचं या जगात जे जे काही चांगलं आहे ते मला कधीच मिळालं नाही...मला नाही तर कोणालाच नाही... आणि म्हणून या सर्व गोष्टी तोडून फोडून टाकाव्यात असं खूप वेळा मनात यायचं.'


'पण तुम्ही त्यावेळी मला सांगितलं, आपल्याला आलेला राग आदळ आपट करून वाया जाऊ द्यायचा नाही,त्याला जपून ठेवायचा,याच रागाला एक हत्यार बनवायचं, पण या हत्यारानं कुणाला इजा करायची नाही,स्वतःला आकार देण्यासाठी या हत्याराचा योग्य वेळी उपयोग करायचा. रागाचं हे हत्यार वापरायचं काहितरी चांगलं "घडवण्यासाठी"... काही "बिघडवण्यासाठी" नव्हे... !!!'


'या वाक्यांनी मला मार्ग मिळाला आणि मी काशी होण्याचा प्रयत्न करू लागलो...!'


'म्हणजे,त्यावेळी मी जे काही बोललो होतो, ते तुला कळलं होतं...? मी हुंदका आवरत बोललो.'


त्यावेळी तुम्ही जे काही बोलला होता सर,ते त्यावेळी "फक्त ऐकायला" आलं होतं... त्याचा "अर्थ कळायला" पुढे काही दिवस गेले... जेव्हा "अर्थ समजला", त्यावेळी जगण्याची सर्वच कोडी सुटत गेली...! मी त्याचा हात घट्ट पकडला...आज माझे शब्द मुके झाले होते... हुंदक्यांनाच आज जास्त बोलायचं होतं...! तुम्ही म्हणालात ना सर ? स्पोर्टस टीचर का व्हायचे आहे ? खूप ऑप्शन आहेत... 


सर माझा गेम चांगला असूनही शाळेमधील स्पोर्ट्स टीचरनी मला डावललं होतं...याचा राग मी मनात धरून होतो... याच रागाला मी जपलं... आता मला स्वतःला स्पोर्ट्स टीचर व्हायचं आहे... 


स्पोर्ट्स टीचर होऊन तळागाळातल्या गोरगरीब मुलांना शिकवायचं आहे...संधी द्यायची आहे...स्टड नाहीत म्हणून कोणी वंचित राहणार असेल,तर अशाला मी माझ्या पैशाने स्टड विकत घेऊन देईन,

इतकी पात्रता स्वतःच्या अंगात भिनवायची आहे... आणि हो परिस्थितीच्या विळख्यात अडकून चुकीच्या मार्गाने राग व्यक्त करणाऱ्या मुलांना *"घातक"* होण्यापासून वाचवायचं आहे...!


भविष्यात मला स्पोर्ट्स अकॅडमी उघडायची आहे,परिस्थिती वाट चुकायला लावते,अशा वाट चुकलेल्यांना,माझ्या अकॅडमी मधून, फक्त "खेळ" नाही,तर;आयुष्यात "खिलाडू वृत्ती" शिकवायची आहे.आम्ही दोघे सुद्धा रस्त्यावर बसलो होतो, आता तो उठत, निघू का सर ? म्हणाला...


बसूनच मी त्याच्या हळूहळू उभ्या राहणाऱ्या मूर्तीकडे पाहू लागलो...हळूहळू त्याचं डोकं आभाळाला टेकलं...पाय मात्र जमिनीवरच राहिले ! 


मी खुजा होऊन त्याच्याकडे डोळे भरून पाहत राहिलो.... जणु पायथ्याशी उभं राहून कुणी हिमालयाची उंची न्याहाळावी...!!! 


१५ जुलै नंतर फी भरायची आहे सर,जमेल ना आपल्याला ? 


त्याच्या या वाक्याने माझी तंद्री भंगली...


माझ्या आयुष्यावर लिहिलेल्या पुस्तकाची वर्षभर विक्री करून तो पैसा मी जून जुलै च्या दरम्यान दत्तक घेतलेल्या मुलांच्या शिक्षणाकरता वापरतो. 


अनेक मुलांच्या फिया भरून आणि शैक्षणिक साहित्य देऊन सुद्धा यातले काही पैसे उरले होते...फी भरायला अजून एक महिना शिल्लक आहे,तेवढ्यात बाकीची पुस्तकं नक्कीच विकली जातील,आणि याची संपूर्ण फी जमा होईल. मी त्याच्या खांद्यावर हात ठेवून फक्त हसलो...! 


येतो सर,म्हणत माझ्या पायाशी तो वाकला...


यावेळी मात्र रागवत मी त्याला उठवलं आणि म्हणालो,'का रे ? बारावीची परीक्षा पास झालास म्हणजे शिंगं फुटली का तुला ? 


तो घाबरला... बावरून माझ्या चेहऱ्याकडे पाहायला लागला...त्याचा हात हातात घेत म्हटलं,'कालपर्यंत मामा होतो मी तुझा,आज एकदम सर कसा झालो रे ? 


यानंतर मामा... मामा म्हणत तो झपदिशी कुशीत शिरला...यानंतर आभाळ भरलं...


जोर जोरात पाऊस कोसळायला लागला...आम्ही सर्वजण भिजून गेलो... 


हा पाऊस त्याच्या डोळ्यातला ? 

माझ्या डोळ्यातला ?? 

की त्याच्या आईच्या डोळ्यातला ??? 


ते मायलेक निघाले,मी त्यांच्या पाठमोऱ्या आकृत्या पाहत होतो...त्याने आईचा हात हाती घेतला होता,आईने मुलाच्या खांद्यावर हात ठेवला होता... आईला आधार देत तो पुढे निघाला होता... 


भविष्यातल्या पिढीला,मार्ग दाखवण्यासाठी.. *घातक" बनण्यापासून रोखण्यासाठी... त्यावेळी रस्त्यातून डौलदार चालीने चाललेला मला तो "दीपस्तंभ" भासला...! 


या दीपस्तंभाला मी सॅल्यूट केला...!!! 


त्याचवेळी आकाशातून विजांचा चमचमाट झाला... कडकडाट झाला...निसर्गाने आत्ताच त्याच्यासाठी टाळ्या तर वाजवल्या नसतील...??? 


मी आभाळाकडं पाहिलं आणि वेडा पाऊस पुन्हा सुरू झाला...!!!


दिनांक : ११ जून २०२४


डॉ अभिजीत सोनवणे,डॉक्टर फॉर बेगर्स

सोहम ट्रस्ट पुणे..


११/६/२४

निराश न होता चालत रहा - डॉ.आ.ह.साळुंखे

मी निराश नाही,कारण प्रत्येक अयोग्य प्रयत्न टाळणे योग्य दिशेने टाकलेले पुढचे पाऊल असते.- थॉमस एडिसन यांनी फार फार वर्षांपूर्वी हे सांगून ठेवलेलं आहे.इतिहास आपली पुनरावृत्ती स्वतः करत असतो.

या पुस्तकातील ऐतिहासिक वाक्याचा अनुभव आम्हाला नुकताच आला कारण होते पुढील प्रमाणे..

तो दिवस,तो क्षण,ती घटना काही क्षणापुर्वी घडून गेल्यासारखी वाटते.


माझे मार्गदर्शक मित्र माधव गव्हाणे (ज्यांना मी सॉक्रेटिस म्हणतो ) जिल्हा परिषद शाळा रायपूर तालुका सेलू जिल्हा परभणी या ठिकाणी शिक्षक म्हणून मुलांच्यात प्रसिद्ध असणारे,मुलांवर मुलांसारखे संस्कार घडवून त्यांना प्रगल्भ नागरिक करण्याचे (ज्याची सध्या फारच गरज आहे.) हे मुलुखावेगळे कार्य करणारे ज्यांचे विद्यार्थी हे तिसरी व चौथीमध्ये शिक्षण घेत आहेत आणि काही आता पुढच्या वर्गात,शाळेत शिक्षण घेत आहेत.ज्यांनी काव्य संमेलनामध्ये कविता सादर केलेल्या आहेत बालभारतीच्या 'किशोर ' सारख्या अभ्यासपूर्ण मासिकामध्ये त्यांच्या कविता,अनुभव लेखन आणि चित्र प्रसिद्ध झालेले आहेत.ती लेकरं वाचलेल्या पुस्तकांवरती परीचयात्मक लेखन करतात.


पुस्तक वाचतात व संबंधित लेखकाशी संवाद साधतात.त्यांच्याशी पत्रव्यवहार करतात.त्या पत्राला उत्तर म्हणून संबंधित लेखकांनी त्यांना पत्रेही पाठवलेली आहेत.


'तुम्हाला जर संधी मिळाली तर तुम्ही तुमची मुलं जाळून टाकाल,की तुमची पुस्तकं ?' असा विचित्र प्रश्न स्किनरनं त्याच्या पहिल्याच टेलिव्हिजनच्या कार्यक्रमात प्रेक्षकांना थेटपणे विचारला होता आणि इतकंच नाही,तर 'मी तर मुलांनाच जाळेन,कारण 'मानवी प्रगतीमध्ये माझ्या पुस्तकांमुळे माझ्या जीन्सपेक्षा जास्त योगदान मिळेल,'असं त्या प्रश्नांचं स्वत:च सरळपणे उत्तरही दिलं होतं!अर्थातच त्याच्या या विधानावर प्रचंड गदारोळ झाला; बऱ्याच उलटसुलट चर्चाही झाल्या.पुस्तकं माणसाला उत्क्रांतीमध्ये एका महत्त्वाच्या केंद्रबिंदू ठिकाणी घेऊन आली.


फार वर्षांपासून डॉ.आ.ह.साळुंखे (तात्यांना) भेटण्याचे नियोजन चालले होते.(पुस्तकातून मनाच्या पातळीवरती आम्ही त्यांना भेटलो होतोच पण प्रत्यक्षात भेट झालेली नव्हती.) संसारीक प्रापंचिक कामामुळे भेटीचा कालावधी पुढे जात होता…


काही वर्षे,दिवस,मिनिटे,सेकंद,गेली आणि दिनांक - ०४.०६.२४ या दिवशी तो भेटीचा योग आला.

'कोणीही तुमच्या मेंदूत सत्य ओतणार नाही.हे तुम्हाला स्वतःसाठी शोधायचे आहे ' नोम चोम्स्कीचा हा शोध पुस्तकाजवळ येवून थांबतो.


मी सकाळी शिरोली फाट्यावर त्या दोघांना घेवून येण्यासाठी माझा टोप गावतील एकमात्र मित्र संतोष पाटील यांना सोबत घेवून गेलो.त्यांच्यासोबत खास तात्यांना भेटण्यासाठी आलेले डॉ.नयन राठोड आले होते.नयन नाव वैशिष्ट्यपूर्ण आहे.याचा अनुभव मला आला,तो पुढे येईलच.घरी आलो आवरलं सौ.मेघाने छान स्वंयपाक केला होता.रोजच्या पेक्षा जेवण आज वेगळे लागले.मित्रांची सोबत असल्याने ते तसे झाले होते.माणसांवर प्रेम करणारे भेटीच्या ओढीने आलेले मित्र सोबत असल्याने जेवण खूप रुचकर आणि आस्वादक वाटत होते.जेवण झाल्यानंतर साताऱ्यासाठी रवाना झालो.गाडी भारत बझारचे मालक चंद्रकांत कदम (आप्पा ) यांच्या घरी जावून लावली.एसटी ने प्रवास सुरू झाला.अनेकांना आपल्या आवडत्या लोकांना भेटवण्याचे महान काम ही एसटी करत असते.मानवी नात्याशी ती जोडलेली आहे.तात्यांचे चिरंजीव राकेश साळुंखे सरांचा फोन येतच होता.एसटीमध्ये आम्ही फक्त एकाच विषयावर चर्चा करत होतो की ज्यांना फक्त आजपर्यंत आपण पुस्तकात वाचलेलं आहे त्यांच्याशी आपण काय बोलायचं..एक प्रकारचा दबावच होता.आदर,प्रेम,

जिव्हाळा या सगळ्या भावना एकत्रित उचंबळून आलेल्या होत्या.काही सुचत नव्हतं इतका आनंद ओसंडून वाहत होता.


एकदाचा या पावन भुमीत पाय ठेवला.असाच पाय इतिहासात ठेवला होता.त्याची आठवण झाली.तो प्रसंग असा होता….


मला वाटतं,आमच्या कामाची दखल ही आतिषबाजीच्या एका तुकड्या पेक्षा दैनदिन कामावरून घेतली गेली तर 

ते आम्हाला जास्त आवडेल.हे शब्द होते चंद्रावर पहिलं पाऊल ठेवलेल्या नील आर्मस्ट्रॉंग याचे..! ऑल्ड्रिन व आर्मस्ट्रॉंग २० जुलै १९६९ वेळ रात्रीचे १० वाजून ५६ मिनिटं ! ईगल चंद्रावर अलगद उतरलं.तेव्हा यानात फक्त २५ सेकंद चालेल इतकंच इंधन शिल्लक होतं..! ईगलचे दरवाजे उघडले आणि आर्मस्ट्राँगनं पहिल्यांदा आपला डावा पाय चंद्रावर ठेवला.त्याच्या पायाचा ठसा उमटला.


(आतून बाहेरून शहारलो.आम्हाला घेण्यासाठी राकेश दादा व सागर शिंगणे मनमोकळे लेखक येत होते.काही वेळ वाट पाहीली..गाड्या येत होत्या,जात होत्या.आणि एका महत्त्वाच्या क्षणी नयन राठोड म्हणाले ही गाडी आपणास घेवून जाण्यासाठी आली आहे.मी म्हणालो कशावरून ते म्हणाले थोडं थांबा..

खरोखरच ती गाडी आली.मला आश्चर्यकारक प्रश्न पडला.व त्यांनी सहजच उत्तर दिलं.


माझं नाव नयन आहे.मी वेगळं काहीतरी बघू शकतो.त्यांच्या या सेन्स चे मला कौतुक वाटले.


एकदाचे घरी आलो.तर तात्या पलंगावर पहूडले होते,

मला तर ते बुद्ध भासले.शरीर थकलेले होते पण मन अविरतपणे करुणेने भरलेले होते.माधव गव्हाणे यांना ते जवळून ओळखत होते.'माधव'आले आहेत,हे दिसताच ते पलंगा वरुन उठले आणि कसे आहात?केव्हा निघाला होता? प्रवास कसा झाला.आदी प्रश्न विचारून आस्थेने चौकशी केली.हे सर्व अनुभवताना तात्यांच्या करुणामय दृष्टीने आम्ही चिंब भिजत होतो.


तात्यांची पुस्तक वाचता वाचता आम्हाला कसं जगायचं याचं ज्ञान प्राप्त झालं.त्या ज्ञान तपस्वी महान व्यक्तीला भेटत असतानाचा प्रसंग माझ्या आयुष्यात आला.

त्याबद्दल त्या प्रसंगाचा त्या क्षणाचा मी सदैव ऋणी आहे. 


त्यांचा तो मायेचा स्पर्श मला माझ्या आईची आठवण करून देत होता.प्रेम भरभरून देणं हेच त्यांचं व्यक्तित्व आहे.हा स्पर्श खूप खूप पुरातन आहे.हे सत्य मला गवसलं.आमच्याशी व्यवस्थितपणे बोलता यावं म्हणून पलंगावरुन उठून आमच्या समोर खुर्चीत बसले.शरीराने पूर्णपणे थकलेले आहे. त्यांना खूप त्रास होतो आहे हे बघून आमच्या काळजाचं पाणी पाणी झालं.आमच्या अगोदर पासुनच तात्यांच्या छायेत असणारे सागर शिंगणे व शब्दशिवार दिवाळी अंकाचे संपादक,कवी इंद्रजित घुले यांच्याशी दिलखुलास चर्चा झाली.माधव गव्हाणे यांनी तात्यांसाठी आणलेली त्यांच्याकडील गोड मिठाई (कलम) तात्यांनी आनंदाने दोन वेळा खाल्ली.


ती मिठाई खात असताना सॉक्रेटीस यांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या होत्या.जीवनाच्या सार्थकतेची ती खुण होती.


अनेक विषयावरती जीवनाच्या पैलूं वरती आम्ही सर्वांनी चर्चा केली.बराच वेळ बसल्यानंतर तात्यांना त्रास होऊ लागला.म्हणून ते विश्रांतीसाठी पलंगाकडे गेले.आमची चर्चा सुरूच होती.काही वेळानंतर परत तात्या म्हणाले की,मला तुमच्या मध्ये परत यायचं आहे आणि चर्चा करायची आहे.ते परत आमच्या मध्ये येऊन सामील झाले.नयन राठोड यांनी त्यांचे चुलते भिमनीपुत्र मोहन नाईक आणि त्यांचे बंधू अमोल राठोड यांनी लिहिलेली काही पुस्तके तात्यांना भेट दिली.त्यांनी आपली ओळख करून दिली.


तात्यांना खळखळून हसवणारा एक प्रसंग जो माधव गव्हाणे यांनी सांगितला.त्यांच्या घरी बुद्धांची मूर्ती आहे.पोस्टमन आल्यानंतर सही करून त्यांच्याकडून आलेलं साहित्य स्वीकारलं जातं.एक वेळ उघड्या दाराच्या फटीतून त्यांचं लक्ष बुद्धांच्या मूर्ती वरती पडलं.त्यावेळी आश्चर्य वाटून त्यांनी विचारलं मला वाटत होते की तुम्ही (सर्वसाधारण प्रवर्गाचे) ओपनच आहात.या प्रसंगापासून त्यांच्या घरी काही जणांनी चहा घेण्याचं जवळजवळ टाळलेलं आहे.


मी त्यांना विचारलं आमच्यासाठी आपल्याकडून आशीर्वाद स्वरुप काही संदेश.. 


काही क्षण थांबून त्यांनी संदेश दिला.तो संपूर्ण मानव जातीसाठी आहे.'जे तुम्ही काम करत आहात ते अखंडपणे करत रहा आणि हे करत असताना अजिबात निराश होऊ नका'.हे वाक्यच आमचं जिवंतत्व बनलेलं आहे.


दुपारी तात्यांच्या घरी भोजन झालं.जेवण करत असताना राकेश दादांसोबत सुद्धा वेगवेगळ्या विषयांवर दिलखुलास आणि वैचारिक चर्चा झाली.नंतर काही पुस्तकांची खरेदी झाली आणि भरलेल्या मनाने आणि जड पावलांनी 'पुन्हा लवकरच भेटू ' असं सांगून आम्ही त्या वास्तूची परवानगी घेतली.घरी येईपर्यंत आम्ही काहीच बोललो नाही.एक प्रकारचा तृप्ततेचा अनुभव आला होता.या अनुभावाचा अनुभव घेऊनही सूर्य अस्ताला गेला.पावसानेही आमचं स्वागत केलं आणि आम्ही घरी आलो.रात्री भोजन करून झोपी गेलो.त्या रात्रीची झोप ही आमच्या साठी खरोखरची झोप होती.सर्वांचे मनापासून आभार व धन्यवाद…


विजय गायकवाड..









९/६/२४

सर्जरी : अँब्रोसी पारे Surgery: Ambrosi Pare

सर्जरी हा शब्द साधारण १३०० साली ग्रीकमधल्या केर (हात) आणि अर्गन (काम करणं) यांच्यापासून बनलेल्या कीसर्गीमधून आला आहे.खरं म्हणजे शस्त्रक्रियांना खूप आधी सुरुवात झाली असं मानलं जातं.ख्रिस्तपूर्व ३००० ते २००० या काळात माणसाच्या कवटीला भोक पाडायची शस्त्रक्रिया केली जायची.ही शस्त्रक्रिया का केली जायची यामागची कहाणीही गमतीशीरच आहे. 


माणसाला कुठलाही आजार व्हायचं कारण म्हणजे त्याच्या डोक्यात भूतं घुसतात असं मानलं जायचं.मग ती भूतं बाहेर काढण्यासाठी माणसाच्या कवटीला भोक पाडलं जायचं.गंमत म्हणजे त्या भोकातून बाहेर काढलेलीही भूतं पुन्हा त्याच भोकातून माणसाच्या कवटीमध्ये घुसतील हे कुणाच्या लक्षात कसं यायचं नाही कोण जाणे! त्या काळात शस्त्रक्रिया करण्यासाठी टोकदार दगड,हातोडी अशी आयुधं वापरली जात असावीत असं मानलं जायचं.पण त्यात होणारा रक्तस्राव कसा थांबवला जायचा हे एक गूढच आहे.


पुराणकाळात हम्मुराबी नावाचा सम्राट होऊन गेला.त्यानं बनवलेल्या नियमावलीत शस्त्रक्रियांसंबंधीचेही उल्लेख होते.त्यानुसार शस्त्रक्रिया करून रुग्णाचा आजार बरा करणाऱ्या डॉक्टरला चांदीची १० नाणी इतका मोबदला मिळायचा.पण हा रुग्ण गुलाम असेल तर मात्र डॉक्टरला फक्त पाचच नाणी दिली जायची.त्या काळी डॉक्टरला कुणावरही शस्त्रक्रिया करताना धडकीच भरायची.कारण त्याच्या हातून शस्त्रक्रियेच्या वेळी रुग्ण दगावला किंवा त्याचा एखादा महत्त्वाचा अवयव निकामी झाला तर मात्र त्या डॉक्टरचे हात छाटले जायचे! इजिप्शियन काळातल्या शस्त्रक्रियांमध्येही गमतीजमती असायच्या. कुणाला माणूस किंवा सुसर चावली तर त्या माणसावर शस्त्रक्रिया करण्याऐवजी त्याच्या जखमांवर कच्चं मांस जोरानं दाबून धरावं असं मानलं जायचं.तसंच कुणाला भाजलं तर आज आपण तो भाग लगेच गार पाण्याखाली धरून त्यावर बरनॉलसारखं मलम लावतो तसं त्या काळात त्या ठिकाणी मंदाग्नीवर तळलेला बेडूक चोळावा किंवा बुरशीत कुजलेल्या लेंड्या लावाव्यात असलाही विचित्र उपाय केला जाई. हे सगळं निरुपयोगी ठरलं तरच शस्त्रक्रियेची वेळ येई.हिप्पोक्रॅटसनंही शस्त्रक्रियेविषयी विवेचन केलं होतं.ख्रिस्तपूर्व ८०० ते २०० या काळात भारतात सुश्रुत हा तर शस्त्रक्रियेच्या बाबतीत अतिशय गाजलेला तज्ज्ञ होऊन गेला.


आठव्या शतकात वैद्यकशास्त्राची खूप पीछेहाट झाली आणि त्याची जागा दैववाद,धर्माचं अवडंबर वगैरे गोष्टींनी घेतली.थिओडोरिक नावाच्या एका राजानं तर अतिशय चमत्कारिक पद्धतच सुरू केली.त्यानुसार जर डॉक्टरचा उपचार लागू न पडल्यामुळे एखादा रुग्ण दगावला तर त्या डॉक्टरला चक्क त्या रुग्णाच्या नातेवाइकांच्या स्वाधीन केलं जायचं.मग त्या डॉक्टरचं पुढे काय करायचं ते त्या नातेवाइकांनी ठरवायचं म्हणे! त्यामुळे अवघड शस्त्रक्रिया करायला डॉक्टर्स धजावायचेच नाहीत! अकराव्या शतकात धार्मिक कारणांवरून मठांमध्ये राहणाऱ्या लोकांना दाढी वाढवायला बंदी घालण्यात आली.त्यामुळे न्हाव्यांची चांगलीच चांदी झाली.इतकंच नव्हे तर हळूहळू आपला वस्तरा हे न्हावी लोकांच्या दाढ्या आणि डोक्यावरचे केस साफ करण्याबरोबरच त्यांच्यावर आपल्या अर्धवट ज्ञानाच्या आधारावर घेडगुजऱ्या शस्त्रक्रिया करण्यासाठीसुद्धा वापरायला लागले! असे हे बार्बर सर्जन पुढची ६ शतकं आपला दुहेरी व्यवसाय बिनबोभाटपणे चालवायचे.बोलोना नावाच्या गावात ह्यूज नावाच्या सर्जननं शस्त्रक्रियेनंतर रुग्णाच्या जखमा कोरड्या ठेवल्या तर त्या लवकर भरून येतात असा सिद्धान्त मांडून गेलनच्या पिढ्यान्पिढ्या चालत आलेल्या संकल्पनांना मोठा धक्काच दिला.गेलननं जखमा नेहमी ओल्या ठेवाव्यात आणि त्यात पू साठू द्यावा म्हणजे त्या पटकन भरून येतात असं म्हणून ठेवलं होतं! ह्यूज आणि त्याचा शिष्य थिओडोरिक यांनी शस्त्रक्रियेपूर्वी रुग्णांना भूल द्यायचे प्रकारही करून बघितले होते. 


पंधराव्या शतकात न्हाव्यांनी शस्त्रक्रिया कराव्यात का नाही यावरून फ्रान्समध्ये गदारोळ माजला.याची सुरुवात न्हाव्यांनी आपल्या शस्त्रक्रिया रुग्णाच्या जखमांमधून वाहणारं रक्त त्या ठिकाणी जळवा चिकटवून थांबवणं,

दुखरा दात उपटणं,तसंच गळू फोडणं यांच्यापुरतं मर्यादित ठेवावं असा नवा नियम बनण्यातून झाली.न्हाव्यांनी साहजिकच आपल्या पोटापाण्यावर गदा आली असल्याच्या भावनेतून या नियमाला तीव्र विरोध केला.

त्यामुळे प्रकरण पाचव्या चार्ल्स राजापर्यंत गेलं.चार्ल्सकडे त्याच्या खास न्हाव्यानं वशिला लावला आणि आपल्या संघटनेच्या बाजूनं निर्णय मिळवला !


हिप्पोक्रॅट्सच्या काळातले उपचार त्या मानानं फारच अघोरी प्रकारातले होते.त्यात उपायांपेक्षा अपायच अनेकदा व्हायचे.शिवाय,सर्जरी करणं हे सर्जनचं काम नसून,न्हाव्याचं काम होतं अशा समजुतीमुळे सर्जरीज ह्या अशिक्षित न्हाव्यांच्या गंजलेल्या,आधी इतरांनी वापरलेल्या हत्यारांनी आणि अंधाऱ्या खोलीत केल्या जायच्या. बंदुकीची गोळी लागून झालेल्या जखमांवर त्या निर्जंतुक करण्यासाठी त्यावर गरम तेल ओतलं जायचं.

इतर कारणांनी झालेल्या जखमा त्यातल्या रक्तवाहिन्या बंद करण्यासाठी त्यावर तापलेल्या लोखंडाच्या सळईच्या डागण्या देऊन बंद केल्या जायच्या.शिवाय ज्या वेळी रक्त वाहात नसेल त्या वेळी जळवा लावून किंवा मुद्दाम जखमा करून रक्त वाहू दिलं जायचं ही गोष्ट तर वेगळीच! हे सगळं आता बदलायला हवं होतं.अँब्रोसी पारे हे करणार होता.१५१० साली फ्रान्समधल्या बुर्ग-हन्सेंट परगण्यात जन्मलेल्या अँब्रोसी पारे या मुळातच प्रज्ञावंत मुलाच्या मनावर जे जे बघू त्या त्या गोष्टींचा खोलवर परिणाम होत होता.हाच मुलगा पुढे बायॉलॉजीच्या विज्ञानामध्ये प्रगतीचा मैलाचा दगड ठरणार होता.! 


त्या काळी अंधश्रद्धांनी आणि जादू‌टोण्यांनी लोकांच्या मनाचा चांगलाच ताबा घेतला होता.तेव्हा काही दगडांच्या उपचारांनी चक्क विषही उतरतं ही त्यातलीच एक समजूत होती.अँब्रोसीचा असल्या थोतांडावर विश्वास नव्हता.हे सिद्ध करायची संधीही त्याला चालून आली.त्या काळी एका श्रीमंत घरातला आचारीच त्या घरातल्या चांदीच्या वाट्या-चमच्यांची चोरी करतोय असा संशय त्याच्या मालकाला आला होता.त्यावर त्याला त्या काळच्या न्यायाधीशांनी फासावर लटकवण्याची शिक्षा सुनावली होती.पण या आचाऱ्याचा या विष उतरवणाऱ्या दगडावर विश्वास होता.तेव्हा त्यानंच मी फासावर जाणार नाही,

त्याऐवजी विष पिईन.पण मला लगेचच विष उतरवणारा खडा गिळायची परवानगी द्यावी.मी जर त्यातून वाचलो तर मला या आरोपातून मुक्त करावं अशी विनंती त्यानं केलीतेव्हा हा प्रयोग अँब्रोसीच्या देखरेखीखाली करण्याचं ठरलं.आणि त्या आचाऱ्याला विष प्यायला दिलं आणि लगेचच त्यानं तो विष उतरवणारा खडाही गिळून घेतला.पण दुर्दैवानं पुढच्या सातच तासांत त्या आचाऱ्याचा मृत्यू झाला आणि असले विष उतरवणारे दगड खोटे असतात हे अँब्रोसीनं सिद्ध केलं! या आणि अशा अनेक न्यायविषयक प्रयोगांतून अँब्रोसीनं मॉडर्न फॉरेन्सिक पॅथॉलॉजीचा पाया घातला.खरं तर अशाच सत्यावर आणि प्रयोगांवर विश्वास ठेवणाऱ्या वैज्ञानिकांमुळे विज्ञानाची आणि माणसाची प्रगती झाली आहे.लहान असताना अँब्रोसी हा आपल्याच सर्जन असलेल्या मोठ्या भावाच्या हाताखाली लुडबुड करत चक्क सर्जरी शिकला आणि नंतर त्याचाच मदतनीस झाला.त्यात त्यानं लवकरच प्रावीण्य मिळवलं.


त्याच वेळी मात्र त्यानं 'हॉटेल दियू' या फ्रान्समधल्या सगळ्यात जुन्या हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय शिक्षण घेतलं.नंतर तो सैन्याचा सर्जन म्हणून फ्रेंच सैन्यात दाखल झाला.आधी त्यानं रुग्णांच्या वेदना पाहिल्या होत्या.

त्यामुळे त्यानं सैनिकांवर जरा कमी वेदना होतील असे उपचार करायला सुरुवात केली.यासाठी त्यानं प्रयोग केला.एकदा बऱ्याच सैनिकांना जखमा झाल्या होत्या.

त्यापैकी अर्ध्यांना त्यानं पूर्वीप्रमाणे तापलेल्या लोखंडी सळईच्या डागण्या दिल्या आणि अर्ध्यांना जखमा बांधून टाकून टर्पेटाइन असलेलं ऑइंटमेंट लावलं.दुसऱ्या दिवशी येऊन पाहिल्यानंतर डाग दिलेले रुग्ण अजूनही वेदनेनं विव्हळत होते,तर ऑइंटमेंट लावलेले सैनिक शांत होते.

डाग दिलेल्या सैनिकांना पुढे जखमा अजूनच चिघळल्यामुळे त्यांना इन्फेक्शन झालं होतं तर ऑइंटमेंटमध्ये असलेल्या टर्पेटाइनच्या अँटिबायोटिक परिणामांमुळे ऑइंटमेंट लावलेल्या सैनिकांच्या जखमा भरून येण्याचं प्रमाण लगेचच वाढलं होतं.


बंदुकीच्या गोळ्यांच्या जखमांवर पारे घरातल्या तापमानाचंच मलम लावत असे आणि रक्त वाहणाऱ्या रक्तवाहिन्या बांधून टाकत असे. या उपायांनी रुग्ण बरे होण्याचं प्रमाण जास्त होतं. त्यामुळे पारेला यशही मिळायला लागलं होतं.पारेनं सैनिकांचे हात आणि पाय तुटलेले पाहिले होते.त्यातून त्यानं अशा प्रकारे अपंग झालेल्या व्यक्तींसाठी पहिल्यांदाच कृत्रिम हात आणि पाय हे अवयव तयार केले होते.त्या काळी एखाद्या स्त्रीची प्रसूती होताना पोटात बाळ जर आडवं असेल किंवा एकच हात किंवा एकच पाय आधी बाहेर येऊन बाळ अडकलं असेल तर त्या काळी पोटातच त्या बाळाचे एक एक अवयव कापून टाकून मग एक एक अवयव पोटातून बाहेर काढावे लागत होते.अर्थातच,अशा अवस्थेत असलेल्या अर्भकांना निर्दयीपणे मारावं लागत होतं.

नाहीतर प्रचंड रक्तस्रावानं त्या स्त्रीचा बळी जायचा.

अँब्रोसीनं अशी बाळंतपणं कशी करावीत याचंही तंत्र त्या काळी विकसित केलं होतं.बाळंतपणातल्या पद्धतींमध्ये त्यानं अनेक सुधारणा केल्या.त्याची हीच परंपरा पुढे चालवत त्याचा शिष्य जॅकस गुलीमाऊ यानं पुढे स्त्रीरोगशास्त्र आणि प्रसूतिशास्त्रात फारच प्रगती घडवून आणली.अँब्रोसीच्या याच शिष्यानं त्याचं काम लॅटिनमध्ये अनुवादित केलं.अँब्रोसीनं व्हेसायलियसच्या कामाचा फ्रेंचमध्ये अनुवादही केला.याचा त्या वेळच्या लॅटिन न शिकलेल्या अशिक्षित बार्बर सर्जन्सना मानवी शरीराबद्दल माहिती मिळावी असा त्याचा हेतू होता.अशा प्रकारे अँब्रोसी पारेनं सर्जरीचं शास्त्र पुढे नेलं.


रेनायसान्सच्या काळात इटलीमध्ये गॅस्पर ताग्लियाकोझी (१५४७ ते १५९९) यानं प्लॅस्टिक सर्जरीच्या बाबतीत खूप मोठी कामगिरी केली.

एखाद्या माणसाची नैसर्गिकरीत्या असलेली किंवा काही कारणांनी त्याच्यात निर्माण झालेली व्यंगं आणि वैगुण्य दूर करण्यासाठी दुसऱ्या माणसाच्या त्वचेचं त्या वैगुण्य असलेल्या माणसाच्या त्वचेवर रोपण करावं असं ताग्लियाकोझीनं सुचवलं. 


यामुळे अनेक लोकांना आपापली व्यंगं झाकता आली.

पण त्याचबरोबर माणसाच्या मूळ रूपात बदल करायच्या या कल्पनेवर धार्मिक वृत्तीच्या लोकांनी आणि चर्चनं जोरदार शाब्दिक हल्ला चढवला.तो इतका भयानक होता,की ताग्लियाकोझी दगावल्यावर त्याचं प्रेत जिथं पुरलं होतं तिथून ते उकरून काढण्यात आलं आणि ते एका घाणेरड्या ठिकाणी पुन्हा एकदा दफन करण्यात आलं.याच सुमाराला फ्रान्समध्ये मूळचे सर्जन्स असलेले आणि न्हावीकाम करत करत सर्जन झालेले बार्बर-सर्जन्स यांच्यात चांगलीच चढाओढ निर्माण झाली.आपल्या हातून काही चूक झाली तर आपल्या अब्रूचे धिंडवडे निघतील या भीतीनं सर्जन लोक हर्निया,

मूतखड्याची शस्त्रक्रिया वगैरे कामं करायला बिचकायचे.पण बार्बर-सर्जन्स मात्र बेधडकपणे या शस्त्रक्रिया करत गावोगाव फिरायचे.सतराव्या शतकात अचानकपणे आपल्या शरीरात दुसऱ्या माणसाचं रक्त भरून घ्यायची विचित्र प्रथा एकदम लोकप्रिय झाली! सुरुवातीला रोगांवर उपचार म्हणून या पद्धतीचा वापर केला जायचा.पण नंतर धडधाकट माणसंसुद्धा विनाकारणच आपल्या शरीरात रक्त भरून घ्यायला लागली.काही काळात ही एक फॅशनच बनली.

राजघराण्यातल्या माणसांनाही या गोष्टीचं आकर्षण वाटायला लागलं.त्यामुळे शरीरात रक्त भरून देणाऱ्या शस्त्रक्रिया करणाऱ्या लोकांचं चांगलंच फावलं.एका माणसाच्या शरीरातून रक्त काढून ते दुसऱ्या माणसाच्या शरीरात भरण्यासाठी वेगवेगळी उपकरणं निघाली. १६६७ साली जाँ डेनिस या माणसानं एका मेंढीच्या शरीरातलं रक्त काढून ते १५ वर्षं वयाच्या एका मुलाच्या शरीरात भरलं. सुदैवानं त्या मुलाला काही अपाय न झाल्यामुळे सगळीकडे हा उद्योग मोठ्या प्रमाणावर सुरू झाला.त्या काळात माणसाच्या शरीरातल्या रक्ताचे वेगवेगळे रक्तगट असतात आणि कुठल्याही रक्तगटाचं रक्त दुसऱ्या कुठल्याही माणसाच्या शरीरात भरून चालत नाही ही महत्त्वाची माहिती कुणाला नसल्यामुळे साहजिकच रक्त भरायच्या या प्रकारांमधून अनेक दुर्घटना घडल्या.


१७१५ साली फ्रान्समधला चौदावा लुई राजा पायाला गँगरिन होऊन मेला.पण त्याच्या अखेरच्या काळात मारेशा आणि फिगो या दोघा वैज्ञानिकांनी केलेल्या शस्त्रक्रियांची आणि उपचारांची सगळ्यांनीच स्तुती केली.यामुळे शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरांची प्रतिमा उजळायला मदत झाली.मारेशानं या परिस्थितीचा फायदा उठवून द पेरोनी या आपल्या शिष्याच्या मदतीनं राजदरबारातलं आणि एकूणच समाजातलं आपलं महत्त्व वाढवून घेतलं.पंधराव्या लुई राजाच्या काळापर्यंत त्यांनी शस्त्रक्रियेला खूपच मानाचं स्थान मिळवून दिलं.मरताना पेरोनी यानं आपली तब्बल ...


१५ लाख फ्रैंक्स इतकी संपत्ती पॅरिसमधल्या सर्जनच्या संघटनेला दान केली.सर्जन्स हे इतर शाखांमधल्या डॉक्टर्सप्रमाणेच अतिशय गुणवान असतात हे सिद्ध करण्यासाठी पेरोनीची धडपड सुरू होती. त्यामुळे त्यानं पॅरिसमधल्या वैद्यकीय महाविद्यालयात शिकवण्यासाठी सर्जन्स नेमले जावेत अशी मागणी केली.राजानं ती मान्य करताच सर्जन्स सोडून इतर डॉक्टर्सचा जळफळाट झाला.

त्यांनी या निर्णयाविरुद्ध मोर्चा काढला,पण त्यामुळे त्यांच्या हाती काही लागलं नाही.