* विजय गायकवाड | Vijay Gaikawad

live

नमस्कार आपले स्वागत आहे. मी पुस्तके आणि मित्रांवर पैसे खर्च करतो,माझ्याकडे दगड आणि विटांवर खर्च करण्यासाठी पैसे नाहीत.-रस्किन बाँड. ही थोर माणसं व त्यांचे विचार मला पुस्तकात भेटलीत.ती भेटली आणि त्यांनी सांगितले कि,प्रत्येक दिवशी असं काही तरी करा की,ते तुम्हाला अधिक सुंदर उद्याच्या दिशेने खूप लांबवर घेऊन जाईल."- डोग फायरबाऊ.'तुम्हाला जर संधी मिळाली तर तुम्ही तुमची मुलं जाळून टाकाल,की तुमची पुस्तकं ?' असा विचित्र प्रश्न स्किनरनं त्याच्या पहिल्याच टेलिव्हिजनच्या कार्यक्रमात प्रेक्षकांना थेटपणे विचारला होता आणि इतकंच नाही,तर 'मी तर मुलांनाच जाळेन,कारण मानवी प्रगतीमध्ये माझ्या पुस्तकांमुळे माझ्या जीन्सपेक्षा जास्त योगदान मिळेल,'असंही त्या प्रश्नांचं स्वत:च सरळपणे उत्तरही दिलं होतं! सर्वियन कादंबरीकार मिलोराद पावीच यांचे एक वाक्य आहे ते म्हणतात - जोवर जगात पुस्तक वाचणाऱ्या वाचकांची संख्या बंदूकधारी सैनिका पेक्षा अधिक आहे तोवर काळजीच काहीच कारण नाही.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात.पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये.म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे मार्गदर्शक, सहकारी धावून येतात.प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,डॉ.दीपक शेटे,आ.भरत बुटाले,प्रा.सर्जेराव राऊत,सुभाष ढगे,अनिल फारणे,डॉ.सुधीर सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,जज्ज,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, पुस्तकातील घटना प्रसंग सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर' पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी पुस्तके, लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत.... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ.मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. - मॅट्रिक फेल विजय गायकवाड

१/१०/२४

सिरी भूवलय / Siri Earth Ring

अद्भुत आणि चमत्कारिक ग्रंथ


आपल्या भारताच्या ज्ञानभांडारात इतक्या जबरदस्त आणि चमत्कारिक गोष्टी लपलेल्या आहेत की,त्या बघून मन अक्षरशः थक्क होतं..! 'हे ज्ञान आपल्या जवळ आलंच कुठून' अशा प्रश्नात आपण गुरफटले जातो.

मग,'त्या काळात हे असलं भारी ज्ञानभांडार आपल्या जवळ होतं, मग आता का नाही..? कुठं गेलं हे ज्ञान..? 'हे प्रश्न आपल्याला सतावत राहतात...!


याच श्रेणीतला असा अद्भुत ग्रंथ आहे - 'सिरी भूवलय'.किंवा श्री भूवलय.जैन मुनि आचार्य कुमुदेंदू ह्यांनी रचलेला.कर्नाटकात जेव्हा राष्ट्रकूटांचं शासन होतं,मुस्लीम आक्रमक यायला बरीच वर्षं होती आणि सम्राट अमोघ - वर्ष नृपतुंग (प्रथम) हे जेव्हा राज्य करत होते,त्या काळातला हा ग्रंथ.अर्थातच सन ८२० ते ८४० च्या काळात केव्हा तरी लिहिला गेलेला..!


मात्र मागील हजार वर्षे हा ग्रंथ गायब होता.

कुठे कुठे याचा उल्लेख यायचा.पण ग्रंथ मात्र विलुप्तावस्थेतच होता.हा ग्रंथ मिळाला कसा, याचीही मजेदार गोष्ट आहे -


राष्ट्रकुटांच्या काळात कोण्या मल्लीकब्बेजी या बाईने या ग्रंथाची एक प्रत नकलून घेतली आणि आपले गुरू माघनंदिनीजी यांना शास्त्रदान केली.या ग्रंथाची प्रत हस्ते-परहस्ते सुप्रसिद्ध आयुर्वेद चिकित्सक धरणेन्द्र पंडितांच्या घरी पोहोचली.हे धरणेन्द्र पंडित,बंगळूर- तुमकुर रेल्वे मार्गावरील दोड्डबेले नावाच्या लहानशा गावात रहायचे.या ग्रंथाबद्दल त्यांना फारशी माहिती नसली,तरी याचं महत्त्व ते जाणून होते.म्हणूनच आपले मित्र,चंदा पंडितांबरोबर ते 'सिरी भूवलय' या ग्रंथावर कन्नड भाषेत व्याख्यानं द्यायचे.


या व्याख्यानांमुळे,बंगळूरच्या 'येल्लप्पा शास्त्री' ह्या तरुण आयुर्वेदाचार्याला,हा ग्रंथ धरणेन्द्र शास्त्रींकडे आहे हे समजले.या ग्रंथासंबंधी येल्लप्पा शास्त्रींनी बरेच काही ऐकले होते.तेव्हा हा ग्रंथ मिळवायचाच,हा निश्चय पक्का होता. मग काहीही करून ह्या ग्रंथाचे हस्तलिखित मिळविण्यासाठी येल्लप्पा शास्त्रींनी,दोड्डाबेलाला जाऊन धरणेन्द्र शास्त्रींच्या पुतणीशी विवाह केला.पुढे १९१३ मधे धरणेन्द्र शास्त्रींचे निधन झाले.पूर्ण वेळ विद्याभ्यासात दिल्याने त्यांच्या घराची आर्थिक स्थिती फारच खराब झालेली होती.म्हणून त्यांच्या मुलाने,धरणेन्द्र शास्त्रींच्या काही वस्तू विकावयास काढल्या.त्यांत 'सिरी भूवलय' हा ग्रंथही होता.अर्थातच आनंदाने येल्लप्पा शास्त्रींनी हा ग्रंथ विकत घेतला. त्यासाठी त्यांना बायकोचे दागिने विकावे लागले. मात्र ग्रंथ हातात आल्यावरही शास्त्रींना त्याची उकल करता येत नव्हती.१२७० पानांच्या ह्या हस्तलिखितात सारेच अगम्य होते.पुढे १९२७ ला प्रख्यात स्वातंत्र्यसेनानी करमंगलम श्रीकंठय्याजी बंगळुरात आले.त्यांच्या मदतीने ह्या ग्रंथाची किवाडं काहीशी किलकिली झाली. या हस्तलिखितातील माहितीच्या आधारे प्रयत्न करत करत,त्यातील सांकेतिक माहितीची फोड करायला तब्बल ४० वर्षे जावी लागली.सन १९५३ मधे कन्नड साहित्य परिषदेनं ह्या ग्रंथाचं पहिल्यांदा प्रकाशन केलं.ग्रंथाचे संपादक होते - येल्लप्पा शास्त्री,

करमंगलम श्रीकंठय्या आणि अनंत सुब्बाराव.यांतील अनंत सुब्बाराव हे तंत्रज्ञ होते.त्यांनीच पहिला कन्नड टाईपरायटर तयार केला होता.


असं काय महत्त्वाचं होतं ह्या ग्रंथात,ज्यासाठी लोकं आपलं आख्खं आयुष्य वेचायला तयार होती..?


हा ग्रंथ,इतर ग्रंथांसारखा एखाद्या लिपीत लिहिलेला नाही,तर हा अंकांमधे लिहिलेला आहे.हे अंकही १ ते ६४ मधील आहेत.हे अंक किंवा आकडे विशिष्ट पद्धतीने वाचले की एखाद्या विशिष्ट भाषेत,विशिष्ट ग्रंथ वाचता येतो. ग्रंथ- कर्त्याच्या,अर्थात मुनी कुमुदेन्दूच्या मते हा ग्रंथ १८ लिप्या आणि ७१८ भाषांमध्ये वाचता येतो.


हा ग्रंथ म्हणजे अक्षरशः विश्वकोश आहे.ह्या एका ग्रंथात अनेक ग्रंथ दडलेले आहेत.रामायण, महाभारत,वेद,

उपनिषदे,अनेक जैन ग्रंथ या एका ग्रंथात सामावलेले आहेत.गणित,खगोलशास्त्र,रसायनशास्त्र,इतिहास,वैद्यक,तत्त्वज्ञान यांसारख्या अनेक विषयांवरील ग्रंथही या एकाच ग्रंथात वाचता येतात.या ग्रंथाची १६,००० पाने होती असा ग्रंथातच कुठे उल्लेख आहे.त्यांतील फक्त १२७० पानेच सध्या उपलब्ध आहेत. एकूण ५६ अध्याय असलेल्या ह्या ग्रंथाच्या फक्त तीन अध्यायांचीच उकल करणे सध्या शक्य झाले आहे.१८ लिप्या आणि ७१८ भाषांपैकी सध्या कन्नड,तामिळ,तेलुगु,संस्कृत,मराठी, प्राकृत इत्यादी भाषांमधूनच हा ग्रंथ वाचता येतो.एखाद्या संगणकीय विश्वकोशासारखे या ग्रंथाचे स्वरूप आहे.ह्या ग्रंथाची संपूर्ण संहिता जेव्हा उलगडली जाईल,तेव्हा त्याची प्रमुख वैशिष्ट्ये स्पष्ट होऊ शकतील.


हा ग्रंथ लिपीत नसून आकड्यात आहे,हे आपण बघितलंच.त्यातही फक्त १ ते ६४ अंकांचाच वापर केलेला आहे.आता कुमुदेंदू मुनीनी फक्त ६४ पर्यंतच आकडे का घेतले..? तर ६४ हे ध्वनींचे संकेत आहेत,ज्यात ऱ्हस्व,दीर्घ आणि लुप्त मिळून २७ स्वर; क, च, न, प सारखे २५ वर्गीय वर्ण; य, र, ल, व सारखे अवर्गीय व्यंजन इत्यादी मिळून ६४ ही संख्या होते.या संख्या २७ × २७ च्या चौकोनांमध्ये मांडल्या जातात.आता हे जे ७२९ अंक चौकोनांमध्ये येतात,ते ग्रंथात दिलेल्या निर्देशांनुसार खालून- वर,वरून-खाली, उभे-आडवे वगैरे करून लिहिले आणि ते त्या भाषेच्या वर्णक्रमानुसार मांडले (उदा - ४ हा अंक असेल तर मराठी तील वर्ण 'घ' येईल.क,ख,ग,

घ..प्रमाणे) तर छंदोबद्ध काव्य अथवा धर्म,दर्शन, कला…वगैरे प्रकारचा ग्रंथ तयार होतो…!


काय अफाट आहे हे...!


आणि किती अद्भुत..! आपण आपल्या 'सुडोकू'चा लहानसा चौकोन तयार करायला संगणकाची मदत घेतो.अन् इथे हजार / बाराशे वर्षांपूर्वी एक जैन मुनी आपल्या कुशाग्र आणि अद्भुत बुद्धीचा परिचय देऊन फक्त अंकांमधून विश्वकोश तयार करतात..!


सारंच अतर्क्स..!!


या ग्रंथाचं प्रत्येक पान म्हणजे २७ × २७ असा ७२९ अंकांचा भला मोठा चौकोन आहे.या चौकोनाला चक्र म्हणतात.अशी १२७० चक्रे सध्या उपलब्ध आहेत.या चक्रांमध्ये ५६ अध्याय आहेत आणि एकूण श्लोकांची संख्या सहा लाखांच्या वर आहे.या ग्रंथाचे एकूण ९ खंड आहेत. उपलब्ध असलेली १२७० चक्रे ही पहिल्या खंडातीलच आहेत,ज्याचं नाव आहे - 'मंगला प्रभृता'. एक प्रकारे हा खंड म्हणजे इतर खंडांची फक्त ओळख आहे.अंकांच्या स्वरूपात यात १४ लाख अक्षरं आहेत.

यातून ६ लाख श्लोक तयार होतात.


या प्रत्येक चक्रात काही 'बंध' आहेत.बंध म्हणजे अंकांना वाचण्याची पद्धत किंवा एका चक्राच्या आत अंक मांडण्याची पद्धत.दुसऱ्या शब्दात सांगायचं तर 'बंध' म्हणजे तो श्लोक,किंवा तो ग्रंथ वाचण्याची किल्ली किंवा पासवर्ड) आहे.या बंधामुळे आपल्याला त्या चक्रातील ७२९ अंकांमधला पॅटर्न कळतो आणि मग त्या त्या भाषेप्रमाणे तो ग्रंथ उलगडू लागतो.या बंधाचे वेगवेगळे प्रकार आहेत.जसे - चक्र-बंध, नवमांक-बंध,

विमलांक-बंध,हंस-बंध,सारस-बंध, श्रेणी-बंध,मयूर-बंध,

चित्र-बंध इत्यादी.गेल्या अनेक वर्षांपासून ह्या भूवलय ग्रंथाला 'डी-कोड' करण्याचे काम चालू आहे.अनेक जैन संस्थांनी हा ग्रंथ,प्रकल्प म्हणून स्वीकारला आहे.इंदूरला जैन साहित्याच्या संशोधनाचं 'कुन्दकुंद ज्ञानपीठ' उभं राहिलंय,जिथे डॉ.महेंद्र कुमार जैन यांनी या विषयावर बरेच काम केले आहे.आय. टी. क्षेत्रातल्या काही जैन तरुणांनी या विषयावरील वेबसाईट तर चालू केलीच आहे,पण संगणकाची मदत घेऊन या ग्रंथाला 'डी-कोड' करण्याचं काम केलं जातंय.अगदी लहान प्रमाणात त्याला यशही आलंय.


मात्र तरीही....


आज एकविसाव्या शतकाचं सोळावं वर्ष संपलेलं असतानाही,जगभरातले अनेक जैन विद्वान या ग्रंथावर काम करत असतानाही,प्रगत संगणक प्रणालीचे अल्गोरिदम वापरूनही...ह्या ग्रंथाची उकल झालेली नाही..! ५६ पैकी फक्त तीनच अध्याय 'डी-कोड' होऊ शकले आहेत...


मग हजार - बाराशे वर्षांपूर्वी,आजच्यासारखी कसलीही साधनं हाताशी नसताना,मुनी कुमुदेन्दूंनी इतका क्लिष्ट ग्रंथ कसा रचला असेल..? बरं, मुनिवर्य कन्नड भाषिक होते.मग त्यांना इतर भाषांचे असे अवजड अल्गोरिदम्स तयार करणं कसं जमलं असेल..?


आणि मुळात इतकी कुशाग्र आणि अफाट बुद्धिमत्ता त्यांच्याजवळ कुठून आली असेल..?


'इंडोलॉजी'च्या क्षेत्रातलं,भारतातलं आदरानं घेतलं जाणारं नाव आहे.श्री.एस. श्रीकांत शास्त्रींचं (१९०४ - १९७४). त्यांनी 'भूवलय' ह्या ग्रंथाबद्दल लिहून ठेवलंय हा ग्रंथ कन्नड भाषा, कन्नड साहित्य,तसेच संस्कृत,प्राकृत,

तमिळ, तेलगु साहित्याच्या अभ्यासाच्या दृष्टीने फार महत्त्वाचा आहे.हा ग्रंथ भारताच्या आणि कर्नाटकच्या इतिहासावर प्रकाश टाकतो.भारतीय गणिताच्या अभ्यासासाठी हा ग्रंथ म्हणजे महत्त्वाचा संदर्भ ग्रंथ आहे.भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवनविज्ञानाच्या विकासाच्या अभ्यासासाठी हा ग्रंथ उपयुक्त आहे. तसेच तो शिल्पे आणि प्रतिमा,प्रतीके यांच्या अभ्यासासाठी देखील उपयुक्त आहे.यातील रामायण,महाभारत,भगवत गीता,ऋग्वेद आणि इतर ग्रंथांची फोड करता आली तर त्यांची आणि सध्या उपलब्ध असलेल्या ग्रंथांची तुलना अभ्यासाच्या दृष्टीने फायदेशीर ठरेल.नष्ट झालेले अनेक जैन ग्रंथ सिरी भूवलयमध्ये सापडू शकतात.


ह्या ग्रंथाची माहिती जेव्हा आपले पहिले राष्ट्रपती डॉ.राजेंद्र प्रसाद ह्यांना मिळाली,तेव्हा त्यांचे उत्स्फूर्त उद्गार होते 'हा श्री भूवलय ग्रंथ म्हणजे जगातलं आठवं आश्चर्य आहे..!' ( भारतीय ज्ञानाचा खजिना-प्रशांत पोळ,स्नेहल प्रकाशन )


एका अर्थानं हे खरंय.कारण जगाच्या पाठीवर कुठेही असा 'एकात अनेक ग्रंथ' असलेला, कूट पद्धतीनं लिहिलेला विश्वकोश आढळत नाही.आपलं दुर्दैव इतकंच की,भारतीय ज्ञानाचा हा अमोल खजिना आपल्याला तरी कुठे माहीत होता..


 

२९/९/२४

पाखरांचे प्रेम / love of birds

पक्ष्यांच्या घरट्यांची रचना त्यांच्या कुळाप्रमाणं बदलत असते.रातवा पक्षी अजिबात घरटं बांधीत नाही.मादी जमिनीवर अंडी घालते.जमिनीवर घरटं बांधणारे दुसरे पक्षी बहुतेक बशीच्या आकाराचं घरटं तयार करतात. त्यांपैकी कुररी (टर्न) आणि जलचर पक्षी घरट्याच्या अस्तराशिवाय शंख-शिंपल्यांचे तुकडे, खडे किंवा गवतासारख्या वस्तू यांचा उपयोग करतात.ज्या पक्ष्यांची झाडावर वीण होते,असे पक्षी काटक्या,मुळ्या,

गवत,शेवाळ,इत्यादी वस्तूंचा उपयोग करून घरटी बांधतात.देवकन्हई मात्र चिखलाचं घरटं बांधते.होल्याचं घरटं म्हणजे आडव्या-तिडव्या ठेवलेल्या चार काटक्या,

नारंग पक्ष्याचं घरटं चेंडूसारखं गोलाकार आणि सुबक असतं.शिंपी पक्षी आपलं घरटं पानांनी शिवून तयार करतो. सुगरण पक्षी तर सुंदर आणि कलापूर्ण घरटी विणण्याकरिता प्रसिद्ध आहे.यजुर्वेदात तिच्या घरट्याचा उल्लेख आढळतो.



'सोमाय लवनालभते त्वष्ट्रे कौलीकान्'


अर्थात सौम्य स्वभावासाठी लवा नावाच्या पक्ष्याकडं व कलाकुसरीसाठी सुगरण पक्ष्याकडं पाहावं.


पक्ष्यांविषयीच्या ग्रंथांतून पाखरांच्या घरट्यांविषयी सविस्तर वर्णनं दिलेली असतात; परंतु पाखरं प्रत्यक्षात घरटी कशी बांधतात याविषयीचं निरीक्षण क्वचितच नोंदलेलं असतं.


 जिज्ञासू पक्षिनिरीक्षकांकरिता ही एक चित्ताकर्षक कामगिरीच आहे.पक्षी पिलांना भरविताना पाहणं जितकं सोपं आहे,तितकं घरटी बांधताना त्याचं निरीक्षण करणं सोपं नाही. याचं कारण असं की,

काही पक्षी आपली घरटी मोठ्या गूढपणे बांधीत असतात.घरटी बांधताना त्यांना कोणी पाहिलं,तर ते घरटं अपुरं सोडून ते निघून जातात.पुन्हा तिकडं फिरकतदेखील नाहीत.


याचा प्रत्यय आपणाला ऋग्वेदात केलेल्या वर्णनावरून येतो.पक्ष्याच्या पिलाप्रमाणं गूढस्थळी ठेवलेला,निधीप्रमाणं मौल्यवान, स्वर्गाहून आणलेला आणि दगडात झाकलेला सोम इंद्रानं प्राप्त केला. (१. १३०. ३). एका ठिकाणी पक्ष्यांची घरटी मृदू असतात असा उल्लेख आहे,तर अन्यत्र ती घरटी उबदार असल्याचा निर्देश आहे. (९. २०. ५)


सुरुवातीला घरट्याची जागा पक्षी जोडीनं शोधतात.अडई नावाची रानबदकं घरट्याची जागा भुईताडाच्या हिरव्या झुडपात निवडतात. झुडपात प्रवेश करण्यासाठी भुयार करतात. भुयार करताना पानं एकमेकांत गुंतवितात.काही चोचीनं छाटून टाकतात.आतल्या भागात बशीच्या आकाराची गादी करतात.त्यासाठी ताडाची पानं आणि पिसं उपयोगात आणतात. बहिरी ससाणा मात्र झाडाच्या शेंड्यावरील मजबूत फांदीच्या दुबेळक्यात घरटं करतो. सर्पगरुड आपलं घरटं उंच वृक्षाच्या शेंड्यावर करतो.

तेथून सारा टापू त्याच्या दृष्टिक्षेपात येतो. 


केम कुकडी आपलं तरंगतं घरटं पाणवनस्पतीच्या साहाय्यानं उंच वाढलेल्या देवधानात करते.परंतु हे घरटं पाण्यापासून फार दूर नसतं.कारण जेवढं घरट्यात प्रवेश करणं सोपं जावं,तेवढंच घरट्यातून निसटून पाण्यात जायलादेखील सहज शक्य व्हावं,असा त्यांचा हेतू असतो.सारस पक्ष्यांची जोडी एका ठरावीक क्षेत्रात,उथळ पाण्यात पाणवनस्पतीचा उंचवटा करून,त्यावर खोलगट आकाराचं घरटं बांधते, तेव्हा ते एखाद्या बेटासारखं दिसू लागतं.


बरेच पक्षी आपलं घरटं साध्या रीतीनं बांधतात. मत्स्य गरुडाची जोडी नवेगावबांध सरोवरातील बेटावर घरटं बांधताना मी अनेक वेळा पाहिली आहे.दर वर्षी त्यांना घरट्यासाठी नवीन जागा शोधावी लागत नाही.झाडावरील जुन्याच घरट्याची ते डागडुजी करतात.त्याकरिता चोचीत काटक्या घेऊन जुन्या घरट्यावर त्या रचतात. 


कित्येकदा हिरव्या पानांची एखादी फांदी तोडून नेतात.

त्यावरून समजतं,की या गरुडानं घरटं बांधण्यास सुरुवात केली आहे.घरट्याचं तक्तपोस तयार होताच त्यावर बसून हे गरुड काटक्या नीट रचून घेतात.ज्या वेळी तक्तपोस उंच होतं,त्या वेळी ते पायांनी तुडवितात.काड्या खाली-वर करून मध्य भागाला खोलगट आकार देतात.


जमिनीवर,तसेच झाडावर घरटी तयार करणारे पक्षी घरटी बांधण्याचं काम ठरावीक एका जागेवर बसून करतात.

घरटं बांधण्याची सामग्री चोचीनं रचीत असतात.त्यानंतर पायांनी तुडवून त्यास मध्यभागी खोलगट आकार देतात.


झाडावर कावळे घरटी बांधताना पाहणं मोठं मनोरंजक असतं.कावळ्यांच्या जोड्या आपापल्या जुन्या घरट्याचा ताबा घेऊन,त्याच्या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात करतात.

घरट्यात जोडीपैकी एक थांबतो.दुसरा घरट्यासाठी काड्या जमा करू लागतो.अनुभवी कावळे घरटं सोडून कधीही जाणार नाहीत.


तरुण कावळ्यांच्या जोड्या घरट्याचं साहित्य गोळा करून ते बांधायला सुरुवात करतात. मोठ्या प्रयत्नानं त्या घरटं रचीत असतात.पुन्हा पुन्हा जोडीनं काड्या गोळा करायला जातात; परंतु एवढ्या प्रयासानं बांधीत असलेल्या घरट्याची प्रगती होत नाही,याचं त्यांना आश्चर्य वाटतं.एकदा मला याचं कारण पाहण्याची संधी मिळाली.

तरुण कावळे घरट्याची सामग्री आणायला गेले,की शेजारच्या घरट्यातील कावळा हळूच त्यांच्या घरट्यातील काड्या चोरून स्वतःच्या घरट्यात आणून ठेवीत होता. तरुण कावळे घरट्याचं साहित्य घेऊन परतले, की तो शेजारचा कावळा,आपण त्या गावचे नाही,असा भाव आणून दुसरीकडं पाहात राही.


पंकोळीसारखे पक्षी आपली घरटी चिखलानं बांधतात.ते बांधताना पाहणं मोठं चित्तवेधक असतं.पक्ष्यांच्या अंड्यांतील जीवांचा विकास ती पाखरांच्या शरीराच्या तापमानाइतकी उबदार ठेवल्यानं होतो.अगदी कमी अथवा जास्त तापमानामुळं अंड्यातील जीव मरून जातो. पक्षी अंड्यांवर बसून त्यांचं योग्य ते तापमान ठेवतात.

पक्ष्याची मादी सर्वच अंडी एका वेळी घालू शकत नाही.

ठरावीक दिवसांच्या अंतरानं ती अंडी घालते.बरेचसे पक्षी रोज एक किंवा एक दिवसा आड एक अंडं देतात.

रानबदकानं घातलेल्या अंड्यांची संख्या मोठी असते.ही संख्या पुरी करायला रानबदकांना एखादा पंधरवडा तरी लागतो.अंडी उबविण्यास मात्र एकाच दिवशी सुरुवात करतात,याचं कारण असं,की शेवटचं अंडं घातल्याशिवाय ती उबविण्यास सुरुवात करीत नाहीत.


 घुबड मात्र एक-दोन अंडी घालताच ती उबविण्यास सुरुवात करीत असल्यानं सगळी अंडी उबविण्यास त्याला दीर्घ काळ लागतो.इतर पक्षी मात्र सुरुवातीच्या काळात अंडी उबवीत नाहीत,तर ती नुसतीच झाकून ठेवतात...


पोट आणि छाती यांच्या मध्ये कातड्याचा भाग असतो.

त्याचा उपयोग पक्षी अंडी उबविण्यासाठी करतात. या कातडीभोवतीची पिसं फुलवून हे पक्षी अंड्यावर त्याचं आवरण घालीत नाहीत, तोपर्यंत ती थंडच असतात.


अंडी उबविण्याचं काम फक्त मादीचं नसतं.लावा आणि पाणपिपुली या पक्ष्यांत फक्त नरच अंडी उबवितो; परंतु बऱ्याच पक्षिकुळांत नर आणि मादी आळीपाळीनं अंडी उबविण्याचं कार्य करतात. अशा वेळी ते एकमेकांपासून घरट्याचा ताबा कसा घेतात, हे पाहणं मोठं मनोरंजक असतं. 


पाखरमाया,मारुती चितमपल्ली,साहित्य प्रसार केंद्र,सिताबर्डी-नागपूर


पाखरांच्या बाबतीत अंडी उबविणं हे कार्य म्हणजे त्यांचा आनंदसोहळा असतो.ते त्यांच्या बाबतीत नुसतं उबविणं राहात नाही,तर ते 'जाणिजे यज्ञकर्म' असतं.असंही दिसून येतं,की अनेक तासांनंतरही अंडी उबविणारा जोडीदार घरटं सोडायला तयार नसतो.घरट्यातून, अल्पकाळ का होईना,नर-मादींना जी मुक्तता लाभते,ती शांततापूर्वक असते.अशा प्रयत्नात एक प्रकारचं आश्वासन असतं.त्यामुळं त्यांचे संबंध दृढ होतात.जोडीदाराला मुक्त करण्यासाठी येणारा पक्षी अंड्यांवर बसण्याचा हेतू अनेक प्रकारांनी व्यक्त करतो.तो पोटावरची पिसं फुलवितो.

हळूवार कूजन करतो.बसलेल्या पक्ष्याला डोक्यानं दुशी मारतो.शक्य असल्यास घरटं बांधण्याचं साहित्य घेऊन येतो.साहजिकच अंड्यांवर बसलेल्या जोडीदाराला नाइलाजानं उठावं लागतं.तो घरट्याचं प्रथम निरीक्षण करतो.अंडी पाहून त्यांवर पुनश्च बसण्याचा मोह त्याला टाळता येत नाही;परंतु जोडीदार ही संधी साधून अंड्यांवर बसतो.पक्षी अंड्यांवर बसला,की तो चोचीच्या टोकानं अंडी घुसळतो.अंड्यांवर बसला असताना हे कार्य तो सतत करीत असतो.अंड्यांवर निरीक्षणासाठी चिन्हं केली,तर असं दिसून येईल की,ही अंडी गोल गोल फिरत असतात.जेणेकरून साऱ्यांना समान ऊब मिळते.जमिनीवर घरटी करणारे पक्षी घरट्याबाहेर चुकून गेलेलं अंडं पुन्हा लोटून आत घेतात.तुम्ही एखादं अंडं घरट्याच्या किनाऱ्यावर ठेवल्यास,पक्षी जेव्हा तिथं येईल,

तेव्हा हा प्रकार त्याच्या लवकर लक्षात येणार नाही.पण जेव्हा तो घरट्यातील अंड्यांवर स्थानापन्न होईल,तेव्हा त्याला काहीतरी चुकल्यासारखं वाटून घरट्याच्या काठावर पडलेलं अंडं तो चोचीनं पुन्हा आत घेईल.अंडं जर त्याच्या आवाक्याबाहेर असेल, तर तो उठून अंड्यापर्यंत जाऊन ते ढकलीत घरट्यात लोटील.


अंड्यातून जीव बाहेर पडण्याची वेळ येते तेव्हा आतील पिलू शरीराचं प्रसरण करीत गोलगोल फिरत असतं.या जीवनचक्रातून जात असताना अंडं तडकतं.तीक्ष्ण अशा चोचीतील दातऱ्यानं पिलू आपल्या भोवतीच्या कवचाला बारीक छिद्र पाडतं.छिद्र उत्तरोत्तर मोठं होत असतं.अशा त-हेनं कवच फोडून द्विज बाहेर येतो.


माता-पिता या जन्मसोहळ्याकडं अनिमिष नेत्रांनी पाहात असताना,त्यांचं निरीक्षण करण्याचा आपण एक अपूर्व अनुभव घेत असतो.अंड्याला छिद्र पाडण्यापूर्वी अंतर्नाद येत असतो.माता-पिता वारंवार घरट्यातील अंड्यांकडं पाहात असतात.पूर्वीप्रमाणे अंड्यांवर बसण्यापेक्षा किंचित पंख पसरून मादी उभी राहाते.हे अभूतपूर्व दृश्य पाहून मला केशिराज संकलित कुकडीयेच्या दृष्टांताची आठवण झाली.


'कुकडी असे : ते आंडी घाली : पीलीं होति : तेयांसि पाखवा दे : अमृतकळा असे ते संचरे : तयातवं तीयें वाढति ।।' यातील अमृतकळेची कल्पना अभूतपूर्व आहे. कोंबडी अमृतकळेचा संचार पिलांना 'पाखवा' देऊन म्हणजे स्पर्शानं करते.


ज्या वेळी अंड्यांतून पिलं बाहेर पडतात,तेव्हा त्यांचे माता-पिता अंड्यांची कवचं उचलून बाहेर फेकतात.


पानगळीनंतर  पाने-फुले सोडून गेली म्हणून झाड त्यांचा द्वेष करत बसत नाही.ते वठत नाही. आपल्या जीवनावरचे प्रेमही सोडत नाही. आपल्या अंगची पुन्हा बहरण्याची आशा सोडत नाही.अनुकूल ऋतू आला की पुन्हा ते बहरून उठते.निसर्गात अशी अनेक दृश्ये आपण बघत असतो.पण त्यातून आपण आवश्यक तो बोध घेत नाही.कुणी सोबत सोडली,नाती तुटली, प्रेमभंग झाला

की माणूस लागलीच वठायला लागतो.जीवनातून उठतो.किंवा इतरांना जीवनातून उठवतो.फुलण्याची शक्यता असूनही तो फुलणे सोडतो.म्हणून हे असे होतो.झाडाला जसा नवा ऋतू भेटतो,तसेच माणसांनाही नवे कुणीतरी भेटत असते.नवे काही तरी घडण्याची शक्यता असतेच.त्यासाठी माणसांनी अवेळी वठून जाणे सोडले पाहिजे.!


डॉ.रवींद्र श्रावस्ती








२७/९/२४

हिमबिबळ्यासोबत / With snowball

त्यांची मोहीम सुरू झाली.हिमालयात एका डोंगरावरून समोरच्या डोंगरावर दिसणारं आश्रयस्थान अगदी जवळ दिसत असलं,तरी त्या दरीत उतरून परत दुसऱ्या डोंगरावर जाणं ही सोपी गोष्ट नसते.रॉड आणि डार्ला यांना या वेळी एक गोष्ट जाणवली,त्यांनी गिर्यारोहणाचं पद्धतशीर प्रशिक्षण घेतलं नसल्याने त्यांच्या अडचणी वाढल्या होत्या. त्यांच्याकडे गिर्यारोहणाची कसलीच साधनं नव्हती.

दोन एप्रिललाच त्यांनी आपला पहिला तळ प्रस्थापित केला.हिमालयात दिवस तसा छोटा वाटतो.एका डोंगराआडून सूर्य वर येतो आणि दुसऱ्या डोंगराआड दडतो,त्या मधल्या काळात मिळेल तो सूर्यप्रकाश.

तीन एप्रिलला सूर्य उगवण्याच्या आधीच रॉड उद्योगाला लागला.तो डोंगरमाथ्यावर पोहोचला.त्याने दुर्बीण डोळ्याला लावली.त्यांनी जिथे सापळा लावला होता त्या कड्यावर त्याला हालचाल दिसली.


तो सापळ्यात अडकलेला बिबळ्या होता.त्या दोघांचा स्वतःच्या नशिबावर विश्वास बसेना.गेले काही महिने हिमवादळात फसलेल्या आणि अनेक अडचणींना तोंड देऊन इथपर्यंत पोहोचलेल्या रॉड आणि डार्लाच्या दृष्टीने तो क्षण अतिशय महत्त्वाचा होता.

पण त्यांच्या मोहिमेचा हेतू फक्त हिमबिबट्या पाहणं एवढाच नव्हता.रॉडने कॅलिफोर्नियात जंगलातील मुक्त प्राण्यांना कसं हाताळावं,त्यांना बेशुद्ध कसं करावं याचं प्रशिक्षण घेतलं होतं.ते कृतीत आणायची वेळ येऊन ठेपली होती.इथे एका रान हिमबिबळ्याला बेशुद्ध करायचं,त्याच्या गळ्यात रेडिओप्रक्षेपक बसवलेली गळपट्टी बांधायची आणि नंतर त्या हिमबिबळ्याला सुखरूप परत सोडायचं,ही त्या प्रशिक्षणाची खरी कसोटी होती.त्यातच याआधी कुणीही, कधीही हिमबिबळ्या पकडलेला नव्हता. त्यामुळे त्यात येणाऱ्या अडचणींबद्दल कुठलीही मार्गदर्शक सूत्रं उपलब्ध नव्हती.त्या हिमबिबळ्याला बेशुद्ध करताना रॉड खूपच नर्व्हस झाला होता.डार्ला त्याला 'मन शांत ठेव' असं वारंवार बजावत होती.एक डोंगर उतरून ते खाली आले तेव्हा रॉडने रायफलच्या साहाय्याने दुरून इंजेक्शन मारण्यापेक्षा जवळ जाऊन खास काठीच्या साहाय्याने इंजेक्शन टोचणं योग्य ठरेल,हा आपला निर्णय जाहीर केला.आता ते चढ चढू लागले होते.मार्ग काटेरी झुडुपांमधून जात होता.त्या पायवाटेवर खूप दगडगोटेही होते.थोड्याच वेळात ते हिमबिबळ्या अडकलेल्या सापळ्याजवळ पोहोचले. हिमबिबळ्या आक्रसलेल्या डोळ्यांनी एकटक त्यांच्याकडे नजर रोखून पाहत होता. त्याने रॉडवर झेप घेतली.त्याची शेपूट जोरात फिरली,पण तो सापळ्यात जेरबंद असल्यामुळे त्याची ही झेप अयशस्वी ठरली. रॉडची अस्वस्थता वाढली होती.तो झपाट्याने त्या हिमबिबळ्याजवळ पोहोचला. त्याने पुढे होऊन ती इंजेक्शनची काठी बिबळ्याच्या खांद्याच्या दिशेने झपकन ढकलली.बिबळ्याने बाजूला झेप घेता घेता पंज्याने ती काठी बाजूला ढकलली. इंजेक्शनमधलं सर्व औषध जमिनीवर सांडलं.रॉड चडफडतला.ते दोघंही थोडं अंतर मागे सरकले,एका आडोशाआड दडले.रॉडने फुंकनळी आपल्या पाठीवरच्या पिशवीतून बाहेर काढली.त्याला आता नवा प्रयत्न करायला हवा होता.झालेल्या घटनेमुळे असेल,तो घामाने डबडबला होता.


त्याने प्रयत्नपूर्वक हात स्थिर राखला.पाण्याची बाटली उघडली.केटामाइन हायड्रोक्लोराइडची पूड पाण्यात विरघळवली.ती इंजेक्शनच्या सिरिंजमध्ये भरली.ते परत त्या हिमबिबळ्या जवळ गेले.त्या बिबळ्याने सुटायची धडपड केली.रॉडने दीर्घ श्वास घेतला,नळी तोंडात धरली आणि जोरात फुंकली.

इंजेक्शनची सुई बिबळ्याच्या दाट,केसाळ कातडीवर आदळली आणि खाली पडली.त्यातलं सर्वच्या सर्व औषध जमिनीवर सांडून वाया गेलं.रॉडने कपाळावर हात मारून घेतला. त्याने परत एकदा इंजेक्शनमध्ये औषध भरलं.या वेळेस त्याने डार्लाऐवजी लोबसांगला बरोबर घेतलं होतं.तिघं त्या हिमबिबळ्याजवळ पोहोचले.रॉड अतिशय संथगतीने गुडघ्यात वाकून एक-एक पाऊल उचलून पुढे पुढे सरकू लागला.

दुसऱ्या बाजूने लोबसांग पुढे सरकला.त्याच्या हालचालीमुळे बिबळ्या फसला.त्याने लोबसांगच्या दिशेने चाल केली.रॉड याच संधीची वाट पाहत होता.

अखेरीस इंजेक्शनची सुई बिबळ्याच्या शरीरात घुसली.रॉडने सुटकेचा निःश्वास टाकला.पहिल्या प्रयत्नाला ४५ मिनिटं होऊन गेली होती.मग बिबळ्या बेशुद्ध व्हायची वाट बघत ते तिघंही बसून विश्रांती घेऊ लागले.अखेरीस बिबळ्या बेशुद्ध झाला.


लोबसांग आणि रॉडने त्या बिबळ्याला उचलून त्यातल्या त्यात सपाट जागेवर ठेवलं.मग त्याच्या गळ्यात रेडिओ लहरी प्रक्षेपक बसवलेली गळपट्टी बांधली.या प्रक्षेपकाला ऊर्जा पुरवणारी बॅटरी दोन वर्ष चालणार होती.तेवढ्यात बिबळ्या शुद्धीवर येण्याची चिन्हं दिसू लागली.रॉडने दिलेला औषधाचा डोस कमी पडला असं त्यांच्या लक्षात आलं. त्यांनी झपाट्याने बिबळ्याची त्या सापळ्यातून सुटका केली.

रॉडने त्याला प्रतिजैविक टोचलं.त्याच्या अंगावरच्या गोचिडी आणि त्याच्या केसांचे नमुने घेतल्यावर ते तिघंही झपाट्याने तिथून दूर झाले.सर्व नमुने गोळा करणं,त्यांच्यावर चिठ्ठ्या चिकटवणं आणि ते जपून ठेवणं,हे काम डार्लाचं होतं.त्याकरिता छोट्या छोट्या काचेच्या कुप्या आपल्याजवळ ती सतत बाळगत असे.त्या बिबळ्याला त्यांनी 'एक' असं नाव लोबसांगच्या सांगण्यावरून दिलं. त्यांनी मग 'एक'च्या कानावर चाकूने खूण केली खरं तर अशा प्राण्यांच्या कानावर गोंदवलं जातं;पण त्यांनी काठमांडू सोडेपर्यंत अमेरिकेतून येणारी गोंदवण्याची सामग्री त्यांना मिळालेली नव्हती.तिथून निघण्यापूर्वी त्या हिमबिबळ्याच्या अंगावरून डार्लाने आपुलकीने

हात फिरवला होता.ते तिथून दूर झाले आणि दहा मिनिटांतच बिबळ्याला हुशारी आली.थोड्याच वेळात पूर्ण शुद्धीवर येऊन तो धडपडत दिसेनासा झाला.मग थोडा वेळ त्याचा माग काढून हेही आपल्या तळावर परतले.जे काही घडलं त्यामुळे रॉड असमाधानी होता.त्याचे फसलेले प्रयत्न,औषधाचं

कमी प्रमाण,फुंकनळी फुंकताना झालेली गफलत यामुळे तो स्वतःवरच चिडला होता.मग ते परत बिबळ्याच्या मागावर निघाले.जिथे बिबळ्याला बेशुद्ध केलं होतं त्या जागेपासून थोड्याच अंतरावर बिबळ्या बहुधा विश्रांती घेत असावा;कारण त्याच्या रेडिओ प्रक्षेपकातून येणारा बिप, बिप असा ध्वनी एकाच ठिकाणाहून येत होता.बिबळ्या ज्या घळीत होता तिथपर्यंत जाऊन खात्री करून घेणं शक्य नव्हतं,तशी अवघड जागा त्याने विश्रांतीसाठी निवडली होती.तो विश्रांती घेतोय की जखमी झालाय,या काळजीने रॉड आणखीनच अस्वस्थ झाला होता.डार्ला त्याला समजवायचा प्रयत्न करून थकली.अखेरीस रात्री उशिरा गळपट्टीतून येणारे इशारे हलू लागले. त्यांच्यापासून बिबळ्या झपाट्याने दूर चाललाय हे लक्षात आलं तेव्हा कुठे रॉड नीटसा भानावर आला.याच सुमारास काही निसर्ग संवर्धकांनी मिळून एक संस्था स्थापन केली होती.


'इंटरनॅशनल ट्रस्ट फॉर नेचर काँझर्वेशन' ही त्यांची संस्था आता रॉडच्या प्रकल्पाच्या मदतीला पुढे आली.

त्यांच्या नेपाळमधील कार्यानुभवाचा रॉड आणि डार्लाच्या हिमबिबळ्या मोहिमेस खूप फायदा झाला. शिवाय त्यांनी या दोघांच्या मोहिमेला आवश्यक ती साधनसामग्री पुरवली आणि आर्थिक मदतही दिली.आयटीएनसीच्या चक मॅक् डुगलने रॉडला दूरछायाचित्रणाबरोबरच वन्यप्राण्यांना बेशुद्ध कसं करावं याचे धडे दिले;त्याबरोबरच एक घडी करून ठेवता येईल आणि हवी तेव्हा फुगवून वापरता येईल अशी एक रबरी होडी दिली.त्या होडीत दोन माणसं बसू शकत होती. या होडीच्या साहाय्याने आता रॉड आणि डार्ला लंगू नदी केव्हाही ओलांडू शकणार होते.याशिवाय आयटीएनसीमुळे त्यांना आता 'स्काय व्हॅन'ची सेवा उपलब्ध होती,ही सर्वांत आनंदाची गोष्ट ठरली.'स्काय व्हॅन' मोटारीला पंख लावावेत तशी दिसते.या विमानाची मागची खालची बाजू पूर्ण उघडून जमिनीला टेकते.त्या उतारावरून एक जीप आरामात विमानाच्या पोटात शिरू शकते.ही जीप आणि माणसांसकट हे विमान पर्वतांवरून उडत जाऊन कुठल्याही सपाट जागी उतरवता येतं.

नेपाळमध्ये तेव्हा सर्व विमानसेवा नेपाळी शाही लष्कराच्या ताब्यात होती.त्यांच्या सहकार्यामुळे यांच्या मोहिमेचा पुढचा मार्ग मोकळा झाला.


'एक'ला रेडिओ गळपट्टी बसवली खरी,पण तरीही त्याचा माग काढणं सोपं नव्हतं.हे एखाद्या दरीत आणि 'एक' दुसऱ्या दरीत असेल तर त्याच्या गळपट्टीतून निघणारे संदेश यांना मिळतच नसत.

सातत्याने उंच डोंगरांवरून चाललं तरच मग 'एक'चा मागोवा घेता येत होता.हे वाटतं तितकं सोपं नाही,

याचा त्यांना लवकरच प्रत्यय आला; पण त्यामुळे त्यांना जास्त काळ 'एक'कडून येणारे संदेश ग्रहण करणं शक्य होऊ लागलं.


त्यांनी नंतर आपली प्रगती 'नॅशनल जिओग्राफिक सोसायटी'ला कळवली.त्यांना त्या संस्थेकडूनही निधी उपलब्ध झाला.त्या दोघांनी आणखी काही हिमबिबळ्यांना रेडिओ गळपट्ट्या बसवल्या.१९८३ चा मोसम त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा ठरला. पण डार्लाच्या मते पहिल्या मोहिमेतल्या अनुभवांमुळे पुढचे थरार फारसे गंभीर वाटले नव्हते.त्यांच्या या यशस्वी मोहिमांमुळे निसर्ग संवर्धक म्हणून या जोडीला जागतिक स्तरावर मान्यता मिळाली.


त्यांचे सर्व चित्तथरारक अनुभव जाणून घ्यायचे असतील तर हे पुस्तक वाचायलाच हवं.एक कारकून स्त्री एक दिवस नोकरी सोडते काय आणि काही दिवसांत हिमालयात येते काय;तिथे यापूर्वी कुणालाही न जमलेल्या प्रयत्नात हे जोडपं यशस्वी होतं काय सगळंच अद्भुत ! •


जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीचे खरे चरित्र शोधायचे असेल,तर तुम्हाला फक्त त्याला कशाची आवड आहे,याचे निरीक्षण करावे लागेल.- शॅनन एल.अल्डर


२५.०९.२४ या लेखातील शेवटचा भाग..।।




२५/९/२४

कारकुन ते संशोधक/Clerk to researcher

विज्ञान,संशोधन यांच्याशी अजिबात संबंध नसलेली डार्ला हिलार्ड काहीतरी वेगळं करायचं म्हणून हिमबिबळ्याच्या शोधमोहिमेत सहभागी झाली.

नेपाळच्या सीमेवरच्या अतिदुर्गम भागातल्या त्या मोहिमेने तिचं आयुष्य बदललं. मनात आणलं तर चारचौघांसारखं जगणारी माणसंही चाकोरी मोडू शकतात,याची जाणीव करून देणारी ही गोष्ट.


 स्नो लेपर्ड (हिमबिबळ्या) हा एक अत्यंत दर्शनदुर्लभ प्राणी आहे.हिमबिबळ्याच्या शोधाचे आणि त्याच्या शास्त्रीय अभ्यासाचे वेळोवेळी अनेक प्रयत्न झाले.

दिवसेंदिवस हा प्राणी नष्टप्राय होत चालला आहे,त्याचं प्रमुख कारण जसं त्याच्या अधिवासावर होणारं मानवी आक्रमण हे आहे;तसंच दिवसेंदिवस अधिक उंचीवर सरकणारी हिमरेषा हेही आहे. नावाप्रमाणेच हिमबिबळ्या हा हिमाच्छादित प्रदेशात आणि त्याखालच्या वनांमध्ये वावरत असतो.डार्ला हिलार्डच्या 'व्हॅनिशिंग ट्रॅक्स फोर इयर्स अमंग द स्नो लेपर्ट्स ऑफ नेपाळ' या पुस्तकात हिमबिबळ्यावरच्या एका विशेष प्रकल्पाचं वर्णन आहे.


हिमबिबळ्यावरचं एक पुस्तक यापूर्वी मी वाचलेलं होतं-पीटर मॅथीसनचं 'स्नो- लेपर्ड'.हे पुस्तक अतिशय वाचनीय होतं.मॅथीसनने हिमबिबळ्याच्या शोधासाठी १९७८ च्या सुमारास काढलेल्या मोहिमेवरचं हे पुस्तक खूप खपलं.मॅथीसन,जॉर्ज शाल्लर ही मंडळी आंतरराष्ट्रीय भटक्या जमातीचं प्रतिनिधित्व करतात.ते खरे निसर्गपूजक आहेत.त्या दोघांवर स्वतंत्र लेख लिहायला हवेत,हे खरं.तरीसुद्धा मी डार्ला हिलार्डवर लिहायचं ठरवलं याला एक खास कारण आहे.डार्लाचा विज्ञानाशी दूरान्वयानेही संबंध नव्हता.ती चौदा-पंधरा वर्षं टायपिस्ट आणि सेक्रेटरी म्हणून काम करत होती.स्नो लेपर्ड प्रकल्पात सामील होण्यासाठी तिच्यापाशी कुठलंही खास कौशल्य किंवा वैज्ञानिक ज्ञान नव्हतं;पण तिचा दृढनिश्चय,जिद्द आणि या प्रकल्पाचा संचालक रॉड जॅक्सन याच्यावरील विश्वास या तीन गोष्टींमुळे वयाच्या बत्तिसाव्या वर्षी ती या मोहिमेत सामील झाली.


(कारकुनीतून संशोधनाकडे - डार्ला हिलार्ड,हटके - भटके,निरंजन घाटे,समकालीन प्रकाशन..)


रॉड जॅक्सन हा वन्यप्राणी शास्त्रज्ञ (वाइल्ड लाइफ बायॉलॉजिस्ट).हिमालयातील हिमबिबळ्यांचा अभ्यास करण्याची कल्पना १९७६ मध्ये त्याच्या डोक्यात जन्माला आली. मोहिमेचा हेतूच खूप महत्त्वाकांक्षी होता- हिमबिबळ्याला रेडिओ प्रक्षेपक असलेली गळपट्टी (रेडिओ कॉलर) बांधणं.ही मोहीम चक्क यशस्वी झाली.

त्यामुळे हिमबिबळ्याबद्दलची बरीच वैज्ञानिक माहिती वन्यप्राणिशास्त्राच्या अभ्यासकांना उपलब्ध होऊ शकली. 


हिमालयाच्या उतारांवर नेपाळ-तिबेट सीमेजवळच्या लांगूदरीच्या परिसरात त्यांचा हा प्रकल्प पार पडला.

अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांना काम करावं लागलं.या मोहिमेत काढलेल्या टिपणांच्या आधाराने डार्लाने हे पुस्तक लिहिलं.सान फ्रान्सिस्कोत कारकुनी करणाऱ्या डार्लाने रॉडबरोबर हिमालयात १६०० कि.मी.पायपीट करावी,ही तिच्या आयुष्यातील सर्वांत अद्भुत घटना म्हणावी लागेल.१९६९ मध्ये जॉर्ज बी.शाल्लरने हिमबिबळ्यांची शोधमोहीम सुरू केली.पाच- सहा वर्षं त्याला या बिबळ्याने चकवा दिला.एकदाच पाकव्याप्त चिथळ खोऱ्यात एका हिमबिबळ्याची मादी आणि तिचं पिल्लू तो पाहू शकला.त्यांच्यासाठी मांस ठेवून त्याने त्यांची पाच छायाचित्रं मिळवली.दरम्यानच्या काळात स्थानिक शिकाऱ्यांनी सात हिमबिबळ्यांची शिकार केली होती.त्यामुळे त्या भागात हिमबिबळ्याचं दर्शन अवघड होऊन बसलं होतं.नेपाळमधली परिस्थिती फारशी वेगळी नव्हती.आता पृथ्वीवर किती हिमबिबळे शिल्लक आहेत याची कुणालाच कल्पना नाही. ते शेळ्या- मेंढ्यांची शिकार करतात म्हणून अजूनही त्यांची सापळ्यात पकडून किंवा विष घालून हत्या केली जाते.यापेक्षाही एक मोठी आपत्ती या प्राण्यांवर आणि इथल्या जनसामान्यांवर कोसळू पाहते आहे.ती म्हणजे पर्यावरणाचा ऱ्हास.या हिमबिबळ्यांवरचं दुसरं मोठं संकट राजकीय आहे.त्यांचा अधिवास असलेले बहुतेक प्रदेश हे एकमेकांना शत्रू मानणाऱ्या किंवा फारसे मित्रत्वाचे संबंध नसलेल्या शेजारी देशांच्या सीमेवर आहेत.


रॉड जॅक्सनचा जन्म तेव्हाच्या होडेशियात १९ जानेवारी १९४४ ला झाला.प्राण्यांचं वेड त्याच्या रक्तातच होतं.पुढे उच्च शिक्षणासाठी तो कॅलिफोर्नियाला राहायला गेला.

त्याने प्राणिशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेतलं.त्याचं आयुष्य बदलून टाकणारी एक घटना अचानक घडली.नेपाळच्या पश्चिम सीमावर्ती भागात १९६१ आणि १९६४ मध्ये दोन ब्रिटिश मोहिमा गेल्या होत्या.त्यांचं नेतृत्व जॉन टायसनने केलं होतं.तो १९७०च्या सुमारास कॅलिफोर्नियात आला असताना त्याने या मोहिमांसंबंधी व्याख्यानं दिली.

मोहिमेशी संबंधित चित्रफीत पाहून रॉड खूप प्रभावित झाला. त्या भागात भरलचे मोठमोठाले कळप वावरत होते.भरल ही पहाडी बकऱ्यांची जात. ती हिमालयात खूप उंचावर आढळते.हे भरल हिमबिबळ्यांचं प्रमुख खाद्य आहे.त्यामुळे या भागात हिमबिबळे आढळण्याची शक्यता अधिक आहे,असं टायसनने जॅक्सनला सांगितलं.हिमबिबळ्याच्या ओढीने १९७६ मध्ये रॉड जॅक्सन पहिल्यांदा या भागात पोहोचला.


त्याला हिमबिबळ्याच्या अस्तित्वाचे अनेक पुरावे मिळाले खरे,पण प्रत्यक्ष हिमबिबळ्याचं दर्शन मात्र घडलं नव्हतं.

१९७७ मध्ये संशोधन अनुदान मिळवता यावं म्हणून रॉड आणि त्याच्या दोन मित्रांनी मिळून 'कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ एन्व्हायर्नमेंटल स्टडीज' ही संस्था (सीआयईएस) स्थापन केली.हिमबिबळ्याच्या संशोधनासाठी अनुदान मिळवणं हे त्याच्या दर्शनाएवढंच दुर्लभ असल्याचं रॉडच्या लवकरच लक्षात आलं. त्याच्या अनुदानाच्या अर्जावर आणि प्रकल्पाच्या मसुद्यावर चर्चा करताना त्याला एक प्रश्न हमखास विचारला जात असे,तो म्हणजे जे जॉर्ज शाल्लरला जमलं नाही ते तुला कसं जमेल? पुस्तकात डार्ला म्हणते,'त्यांना रॉडसारखा प्राणिशास्त्रज्ञ जर या कामासाठी अननुभवी वाटत होता,

तर रॉडची प्रमुख सहायक असलेल्या डार्ला हिलार्डचा प्राणिशास्त्राशी काहीच संबंध नाही,हे कळलं असतं तर काय वाटलं असतं ?' डार्ला छोटी असताना तिचे वडील तिला आणि तिच्या भावंडांना घेऊन उन्हाळ्याच्या सुटीत सिएरा नेवाडा पर्वतराजीत जात.ही दोन आठवड्यांची सुट्टी डार्लाला खूप आवडत असे. रात्री शेकोटीभोवती गप्पा,झऱ्याच्या पाण्यात स्नान हे तिच्या दृष्टीने खरोखरच स्वर्गसुखासमान होतं.पुढे तिने चार वर्षं टायपिस्ट म्हणून काम केलं.त्यानंतर सेक्रेटरी म्हणून एका आर्किटेक्चरल फर्ममध्ये काम करण्यासाठी ती इंग्लंडला पोहोचली. त्या चार वर्षांत ती युरोपभर भटकली.त्या वेळी एकदा ग्रीसमधल्या एका खेड्यातल्या घरात राहताना तिला खेड्यातलं जीवन आपल्याला अधिक भावतं हे लक्षात आलं.तेरा वर्षं कारकुनी काम केल्यानंतर १९७८ मध्ये तिला आपण काही तरी वेगळं करायला हवं असं वाटू लागलं.बरं,ती पदवीधर नव्हती. अशी अर्धशिक्षित,बत्तीस वर्षांची बाई वेगळं तरी काय करणार? त्याच वेळी नेमकी रॉडच्या संस्थेची एक जाहिरात तिच्या पाहण्यात आली. शनिवार-रविवार निसर्गाच्या सान्निध्यात राहून निसर्गेतिहासाचे प्राथमिक धडे गिरवायचे,हा उद्योग तिला नेहमीपेक्षा वेगळा वाटला.तिने त्वरित संस्थेचा दरवाजा ठोठावला.पहिल्या भेटीतच डार्लाची रॉडशी मैत्री झाली.ही मैत्री पुढे वाढत गेली.डार्लाला त्याचं निसर्गप्रेम खूप भावलं.नेपाळच्या लांगू खोऱ्यातून तेव्हा तो परतला होता,पण मनाने अजून त्या भागातच वावरत होता.

जसजसे दिवस लोटत होते तसतसा तोअस्वस्थ होत होता;पण आर्थिक प्रश्न कसा सोडवायचा,हे काही त्याला सुचत नव्हतं. हिमबिबळ्याचा माग काढणं म्हणजे यशाची खात्री नसलेला प्रकल्प;त्यासाठी त्याला कुणीच त्राता भेटत नव्हता.अशा परिस्थितीमध्ये त्याला एका नियतकालिकात एक जाहिरात दिसली 'द रोलेक्स ॲवॉर्ड'ची.'रोलेक्स पारितोषिक' दर दोन वर्षांनी जगावेगळ्या पण महत्त्वाच्या कार्यात गुंतलेल्या व्यक्तींना दिलं जातं.दर वेळेस त्यासाठी पाच व्यक्तींची निवड केली जाते.या व्यक्तींना ५० हजार स्विस फ्रैंक्स या कार्यासाठी मिळतात. (साधारणपणे २५ हजार अमेरिकी डॉलर) एखाद्या सामाजिक-सांस्कृतिक क्षेत्रात काही तरी नवा मार्ग चोखाळणाऱ्या व्यक्तीला,तसेच विज्ञान आणि पर्यावरणाच्या क्षेत्रात चाकोरीबाहेर पडून कार्य करणाऱ्या व्यक्तीला हे पारितोषिक मिळतं.


रॉडला डार्ला स्वीय सचिव म्हणून एका मोठ्या कंपनीत काम करते हे ठाऊक होतं.त्यामुळे त्यानं 'रोलेक्स पारितोषिकासाठी प्रकल्प सादर करायचाय,तू तो टाईप करशील का,तसंच त्यात व्याकरणशुद्ध मजकूर आणि त्याचं संपादन करणं यासाठी मदत करशील का?'असं विचारलं.प्रकल्पाचं नाव होतं, 'अ रेडियो ट्रॅकिंग स्टडी ऑफ स्नो लेपर्ड्स इन नेपाल'.डार्लाने होकार दिला.या अभ्यासाबरोबरच 'भरल आणि हिमालयन तहर' या दोन पर्वती बकऱ्यांचाही अभ्यास करायचा होता.

रॉडचा हा प्रकल्प मान्य झाल्याची तार त्याला नोव्हेंबर,८० मध्ये मिळाली.तो या दोघांनाही आश्चर्याचा सुखद धक्काच होता.या पारितोषिक वितरण समारंभासाठी त्यांना जिनिव्हाला बोलावण्यात आल्याचं पत्र या तारेमागोमाग येऊन थडकलं.हा समारंभ एक आठवडाभर चालतो.तो मे १९८१ मध्ये साजरा होणार होता. दरम्यानच्या काळात हे दोघं इतर प्रकल्पांवर काम करत होते.त्या निमित्ताने त्यांची जवळीकही वाढत होती.जिनिव्हाला दोघं एकत्र जाणार हे निश्चित होतं,पण पुढे काय हा प्रश्न होता.डार्लाने लग्न करून दोघांनी हिमालयात जावं असं सुचवलं.रॉडने तिला अशा मोहिमांत येणाऱ्या अडचणी अगदी रंगवून रंगवून सांगायला सुरुवात केली.डार्लाला तर तिच्या कारकुनी आयुष्यातून सुटका हवी होती.त्यामुळे तिचा त्या मोहिमेवर जाण्याचा निश्चय अधिकाधिक दृढ होत होता.


हिमबिबळ्या मध्य आशिया,अफगाणिस्तान,पाकिस्तान,

भारत,नेपाळ आणि तिबेटमधील हिमाच्छादित पर्वतरागांमध्ये आढळतो.या सव्वा कोटी चौरस कि.मी. भूप्रदेशात मिळून जेमतेम पाच-सहा हजार हिमबिबळे अस्तित्वात असावेत असा एक अंदाज व्यक्त केला जातो.गेल्या चाळीस वर्षांत या बिबळ्यांच्या अधिवासा -

पैकी फक्त दोन ते चार टक्के भागाचा जेमतेम अभ्यास झाला आहे.'इंटरनॅशनल युनियन फॉर काँझर्वेशन ऑफ नेचर' या संस्थेच्या नाहीशा होत चाललेल्या प्राण्यांचा यादीत नऊ प्रकार आहेत.त्यातल्या लवकरच नष्ट होऊ शकतील अशा प्रकारात हिमबिबळ्याचा समावेश केलेला आहे. त्यामुळेच हिमबिबळ्याच्या अभ्यासासंदर्भात रॉडनी जॅक्सनची मोहीम फार महत्त्वपूर्ण मानली जाते.नोव्हेंबर १९८१ मध्ये रॉड आणि डार्ला काठमांडूत दाखल झाले.या शहरामध्ये या मोहिमेचा मुख्य तळ असणार होता.


मोहिमेत एकूण सहाजण असणार होते.त्यातला कुर्ट स्टोल्झेनबर्ग हा अमेरिकी सहाध्यायी डार्लाच्या या मोहिमेतील सहभागाबद्दल काहीसा साशंक होता.

मोहिमेतले उरलेले तीन सदस्य स्थानिक नेपाळी होते.या तिघांना नेपाळी भाषेतला एकही शब्द माहीत नव्हता.डार्ला आणि कुर्ट यांच्यावर खरेदीची जबाबदारी सोपवून रॉड सरकारी कारकूनशाहीशी झगडत होता.

त्यांच्या नेपाळी सदस्यांतला जमुना हा जीवशास्त्रज्ञ अनुदान देणाऱ्या संस्थेनेच पुरवला होता.जमुनावर हिमबिबळ्याचं मुख्य भक्ष्य असणाऱ्या भरल या प्राण्याच्या अभ्यासाची प्रमुख जबाबदारी होती.त्याशिवाय तहर म्हणजे हिमालयात उंचीवर आढळणाऱ्या शेळीचाही त्याने अभ्यास करावा,अशी सूचना करण्यात आली होती. याशिवाय कर्केन अणि लोपसांग हे दोन शेर्पा त्यांच्या मदतीस होते. त्यांचा दुसरा मुक्काम डोल्फू इथे होता.

इथलं खाणं आणि राहण्याची व्यवस्था बघून कुर्टला धक्का बसला.दरम्यानच्या काळात त्याची आणि जमुनाची मैत्री झाली होती.कुर्टने यापुढे याहून कष्टांत राहावं लागेल हे कळल्यावर मोहीम सोडून अमेरिकेत परतायचं म्हणून तिथून रॉडचा निरोप घेतला.जाताना तो जमुनालाही बरोबर घेऊन गेला.आता रॉड,डार्ला आणि मिळेल ती स्थानिक मदत यावरच मोहीम पार पाडावी लागणार होती.त्या वर्षी यापूर्वी कधी नव्हे एवढी थंडी डोलफूने अनुभवली.डार्ला लिहिते,'हे आधीच कळतं तर आम्हीही काही दिवसांसाठी काठमंडूला परतलो असतो.'


हिमवर्षाव संपायला एप्रिल उजाडला.तोपर्यंत अन्नाची वानवा निर्माण झाली होती.मधल्या काळात त्यांनी सामान वाहून नेण्यासाठी एक याक आणि बिबळ्याला आमीष म्हणून एक शेळी घेतली होती.शिधासामुग्री आणायला रॉडला परत काठमांडूला जावं लागणार होतं. जाऊन परत यायला सहा ते सात आठवडे लागणार होते.त्यांना छोटं विमान भाड्याने मिळालं तर हवं होतं.पण नेपाळमध्ये तेव्हा सर्व विमानं सरकारी मालकीची होती.ती मिळवायची तर बरेच कागदी घोडे नाचवावे लागणार होते. जुलैच्या मध्यास मोसमी पावसाला सुरुवात होते. त्यामुळे आता रॉड काठमांडूहून परतल्यानंतर त्यांना हिमबिबळ्याच्या अभ्यासाकरिता फक्त एक महिनाच जेमतेम मिळणार होता.


राहिलेला शिल्लक भाग पुढील लेखमालेत..।