* विजय गायकवाड | Vijay Gaikawad

live

नमस्कार आपले स्वागत आहे. मी पुस्तके आणि मित्रांवर पैसे खर्च करतो,माझ्याकडे दगड आणि विटांवर खर्च करण्यासाठी पैसे नाहीत.- रस्किन बाँड.ही थोर माणसं व त्यांचे विचार मला पुस्तकात भेटलीत.ती भेटली आणि त्यांनी सांगितले कि, प्रत्येक दिवशी असं काही तरी करा की,ते तुम्हाला अधिक सुंदर उद्याच्या दिशेने खूप लांबवर घेऊन जाईल."- डोग फायरबाऊ.' सर्वियन कादंबरीकार मिलोराद पावीच यांचे एक वाक्य आहे ते म्हणतात - जोवर जगात पुस्तक वाचणाऱ्या वाचकांची संख्या बंदूकधारी सैनिका पेक्षा अधिक आहे तोवर काळजीच काहीच कारण नाही.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात.पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये.म्हणून अविरतपणे प्रयत्न करणारे मार्गदर्शक, मित्र धावून येतात.प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,डॉ.दीपक शेटे,आ.भरत बुटाले,प्रा.सर्जेराव राऊत,सुभाष ढगे,अनिल फारणे,डॉ.सुधीर सरवदे ,विश्वास खाडे, विनायक पाटील,संजय कुंभार,सतीश खाडे,मनोहर सुर्वे,गणेश खंदारे,तात्या गाडेकर, दादासाहेब गाडेकर, दादासाहेब ताजणे, पुस्तकातील घटना प्रसंग सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील यांनी केलेले आहे. मला लिहिण्याची प्रेरणा देणारी पुस्तके,लेखक,प्रकाशक,मित्र ही जगावेगळी माणसं माझ्या जीवनातील महत्वाचा टप्पा आहेत.... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ.मेघा गायकवाड, चिरंजीव मयान,माझ्या धावण्यातील गुरुवर्य नामदेव बरुरे,लुल्ला शेख मोठी ताई ,लहान ताई जयश्री शिंदे या सर्वांचेच मनापासून आभार व धन्यवाद मॅट्रिक फेल विजय गायकवाड

१९/१/२६

तुमच्यासोबत जग आहे.The world is with you.

१२.०१.२०२६ या लेखातील २ रा भाग पुढे सुरु…!


डान्ससाठी भाड्याने दिला,तर मिळतील! जर मी बॉलरूमबाबत बीस रात्रींसाठी टायअप केले, तर मात्र तुम्ही तोट्यात जाल."


"आता तोट्यांचा कॉलम पाहू.तुम्ही माझ्याकडून अधिक फायदा मिळवू पाहत आहात,पण तेवढे भाडे मी देऊच शकत नाही,त्यामुळे मला माझी व्याख्यानमालेची जागा बदलावी लागेल."


"यामुळे दुसरा तोटा होईल तो असा माझ्या व्याख्यानांना पांढरपेशा,उच्चभ्रू,सुशिक्षित वर्ग येतो.त्यामुळे तुमच्या हॉटेलची आपोआप जाहिरात होते.पाच हजार डॉलर्स खर्च करून जाहिरात देण्यानेसुद्धा एवढे लोक हॉटेलकडे वळणार नाहीत,जेवढे माझ्या व्याख्यानांमुळे येतात.यामुळे हॉटेलची प्रतिष्ठा वाढते.हो ना?"


तोटे या शीर्षकाखाली मी हे दोन मुद्दे लिहिले.तो कागद मॅनेजरच्या हातात सुपुर्द केला आणि त्याचा अंतिम निर्णय कळवण्यास सांगितले.दुसऱ्या दिवशी मला त्यांचे पत्र मिळाले.माझ्यासाठी त्यांनी आधी ३००% भाडे वाढवले होते,ते आता ५०% नी वाढले फक्त !


लक्षात घ्या,ही सवलत मिळवण्यासाठी 'मला काय हवे आहे' याबद्दल मी एक अक्षरही बोलण्याची गरज पडली नाही.मी सतत हेच बोलत राहिलो की,यात त्याचा काय फायदा आहे !


कल्पना करा,मी रागाच्या भरात त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन म्हणालो असतो,'तुम्ही माझे भाडे तीनशे टक्क्यांनी वाढवले याचा अर्थ मी नेमका काय समजायचा? माझ्या व्याख्यानांची तिकिटे छापली गेली आहेत आणि जाहिरातही करून झाली आहे,हे माहीत असतानाही तुम्ही असे का वागलात? तीनशे टक्के ? तुम्हाला वेड लागलेय का? मी एवढे पैसे मुळीच देऊ शकत नाही.'


जोरजोरात वादावादी झाली असती.आणि तुम्हाला माहीत आहे की,वादावादीचा शेवट काय होतो? जरी मी त्याला त्याची चूक दाखवून व पटवून दिली असती,तरी त्याच्या 'इगो' मुळे त्याला शरण येणे अवघड झाले असते.


मानवी नातेसंबंधाबद्दल हेन्री फोर्डने दिलेला हा सर्वांत महत्त्वाचा सल्ला वाटतो तो म्हणतो,'समोरच्याच्या दृष्टिकोनातून आणि त्याच वेळी स्वतःच्या दृष्टिकोनातून एखाद्या घटनेकडे बघण्याची क्षमता असायला हवी.हेच यशाचे रहस्य आहे.'


किती मोलाचे आहे हे वाक्य ! मला त्याचा पुनरुच्चार करण्याचा मोह होतोय.'समोरच्याच्या दृष्टिकोनातून आणि त्याच वेळी स्वतःच्या दृष्टिकोनातून एखाद्या घटनेकडे बघण्याची क्षमता असायला हवी.हेच यशाचे रहस्य आहे'


ज्याला हे जमते,तोच यशस्वी !


किती सोपं तत्त्वज्ञान आहे हे! पण या पृथ्वीवरचे नव्वद टक्के लोक नव्वद टक्के वेळा या गोष्टीकडे दुर्लक्ष करतात !


उद्या सकाळी तुमच्या टेबलावर पत्रे येऊन पडतील ती वाचा.

तुमच्या लक्षात येईल की,बहुतांशी पत्रांमध्ये वरील नियमाचे पूर्णतः उल्लंघन केलेले असते. 


उदाहरणादाखल मी तुम्हाला खालील पत्र वाचायला देतो.

रेडिओमधील जाहिरात विभागाच्या प्रमुखाने हे लिहिले आहे,

ज्यांची कित्येक कार्यालये देशभर पसरली आहेत.प्रत्येक स्थानिक रेडिओ स्टेशनच्या मॅनेजरला हे पत्र विभागप्रमुखांनी पाठवले आहे. (कंसात माझ्या प्रतिक्रिया आहेत.)


मि.जॉन ब्लॅक,

ब्लॅकव्हिले,

इंडिआना 

प्रिय मि. ब्लॅक


जाहिरातीचे वितरण रेडिओ क्षेत्रात असेच चालू राहू द्यावे,अशी या कंपनीची अशी इच्छा आहे.


(कंपनीची काय इच्छा आहे याची आम्हाला काय पडलीय ? आमच्यापुढे आमचे प्रश्न आहेत.बँकेने घरावरील तारण काढून घ्यायचे ठरवले आहे ! घरातील शोभेच्या झाडाला किडे कुरतडतायत.काल शेअर मार्केट पार कोसळले.सकाळी सव्वा आठची ट्रेन चुकली माझी!काल जोन्सकडे डान्सपार्टीला आमंत्रण मिळाले नाही.माझे ब्लडप्रेशर वाढले आहे,असे डॉक्टर म्हणतात. मला न्युरायटीस झाला आहे आणि माझ्या डोक्यातील कोंडा खूप वाढला आहे! त्यामुळे आज सकाळी ऑफिसमध्ये येताना मी फार निराश होतो.त्यात पत्राची पेटी उघडली,तर हे पत्र ! म्हणे कंपनीची इच्छा ! असली पत्रे कधी पाठवायची असतात का? असली माणसे जाहिरातीच्या क्षेत्रातून बाहेर फेकण्याच्याच लायकीची असतात.)


आमच्या जाहिरात कंपनीचे नेटवर्क संपूर्ण देशात फोफावले आहे.रेडिओवर जास्तीतजास्त आम्हीच जाहिराती देत असतो.

त्यामुळेच वर्षानुवर्षे आम्ही आघाडीवर आहोत.


(अरे वा! तुम्ही मोठे श्रीमंत,तुम्ही हुशार,तुम्ही ग्रेट ! आहात कोण तुम्ही ? स्वतःला काय समजता? कोणीही असलात,तरी आम्हाला काय घंटा फरक पडतो? तुम्ही जनरल मोटर्स इतके गडगंज आहात की जनरल इलेक्ट्रिकल्स आणि यू. एस. आर्मीच्या जनरल स्टाफइतके मोठे आहात की त्या सगळ्याचे कॉम्बिनेशन आहात तुम्ही? मला मी किती मोठा आहे यामध्ये स्वारस्य आहे,तुमच्या मोठेपणात नाही.तुमच्या या धवल यशामुळे मी स्वतःला लहान आणि कमी महत्त्वाचे असल्यासारखे मानतो.)


आमची अशी इच्छा आहे...


(अरे देवा,तुमची इच्छा ! सतत तुमचीच इच्छा! एक निर्बुद्ध गाढव आहेस तू.तुझी काय इच्छा आहे किंवा अमेरिकेच्या प्रेसिडेंटची काय इच्छा आहे यामध्ये मला मुळीच इंटरेस्ट नाही.मी तुला एकच सांगतो की,माझ्या इच्छेतच मला रस आहे आणि तुझ्या या संपूर्ण वायफळ पत्रात माझ्या इच्छेचा मुळीच उल्लेख नाही.)


..म्हणून आमच्या कंपनीला तुमच्या निवडक यादीत समाविष्ट कराल? त्यासाठी तुमच्याकडे कोणती वेळ आमच्यासाठी आहे याबद्दल सविस्तर आम्हाला कळवा.


(निवडक यादी म्हणे! काही अक्कल आहे का? सतत आपल्या कंपनीची आरती ओवाळून तुम्ही आम्हाला कमी लेखत आहात आणि पुन्हा मला निवडक यादीत तुम्हाला समाविष्ट करायला सांगत आहात? साधे 'कृपया','प्लीज' म्हणण्याचा शिष्टाचारसुद्धा तुम्ही पाळत नाही? याला विनंती तरी कसे म्हणावे?)


तुमचा निर्णय काय झाला याचे उलट टपाली त्वरित उत्तर पाठवावे.ते दोघांनाही बरे पडेल.


(काय मूर्ख माणूस आहे! तू मला कसले विचित्र पत्र पाठवलेस ! उन्हाळ्यातील पानगळ जशी सर्वदूर पसरते, तसे इतस्ततः

विखुरलेले हे पत्र आहे.मी आधीच माझ्या चिंतांनी ग्रस्त आहे.घराचे कर्ज,माझे इन डोअर प्लाण्ट, माझे बी. पी. एक ओळ लिहायला फुरसत नाही मला आणि तू म्हणतोस 'त्वरित'! समजतोस काय तू 

स्वतःला ? 'त्वरित' या शब्दाचा अर्थ तरी समजतो का तुला? तुझ्याइतकाच मीपण बिझी आहे.मला हुकूम सोडण्याचा अधिकार कोणी दिला तुला? शेवटी तू 'दोघांनाही बरे पडेल' म्हणालास,


ते एकच बरे केलेस.निदान माझापण विचार केलास, पण त्यात माझा काय फायदा आहे,याबद्दल माझ्या मनात संभ्रम आहे.)


तुझाच विश्वासू


जॉन डे


मॅनेजर-रेडिओ विभाग


ता. क. - ब्लॅकव्हिले जर्नलची एक प्रत तुमच्यासाठी पाठवत आहे.

तुम्हाला हवी असल्यास तुमच्या स्टेशनवर प्रक्षेपित करू शकता.


(हुश्श! शेवटी का होईना,तू असे काहीतरी सांगितलेस ज्यामुळे माझी निदान एक समस्या सुटली.पण ही गोष्ट तू पत्राच्या सुरुवातीला लिहिली नाहीस ! जाऊ दे.आता काय उपयोग? तुझ्यासारखा जाहिरातक्षेत्रातील अनुभवी माणूस जेव्हा अशी चूक करतो,तेव्हा त्याच्या मेंदूतच काहीतरी बिघाड असतो.आमच्या पत्राची गरज नाही. तुला तर गरज आहे ती तुझ्या थायरॉइड ग्रंथीमध्ये झालेला बिघाड दुरुस्त करण्यासाठी जास्त आयोडिन असण्याची!)


लक्षात घ्या,ज्यांची उभी हयात जाहिरातक्षेत्रात गेली आहे आणि जे लोकांना एखादी गोष्ट विकत घ्यायला भाग पाडतात,ते जर अशी पत्रे लिहू शकतात,तर आपण एखाद्या खाटकाकडून किंवा बेकरीवाल्याकडून कोणत्या दर्जाच्या पत्रांची अपेक्षा करू शकतो ?


इथे मी ज्या पत्राचा नमुना देतो,ते एका सुपरिटेंडंटने एडवर्ड व्हर्मिलेन नावाच्या त्याच्या विद्यार्थ्याला लिहिले आहे.तुम्ही स्वतः हे पत्र वाचा आणि विचार करा.


ए झिरेंगाज सन्स

२८ फ्रंट स्टेशन,

ब्रुकलिन एन. वाय. ११२०१,


अटेन्शन : मि. एडवर्ड व्हर्मिलेन


महोदय,


काही साहित्य वेळेवर पोहोचू न शकल्यामुळे आमच्या रेडिओ रिसिव्हिंग स्टेशनवरील कामकाज बंद पडले आहे.ते साहित्य आज दुपारी फार उशिरा पोहोचल्याने आमची कोंडी झाली आहे.

परिणामी आमच्या कामगारांना नेहमीपेक्षा अधिक वेळ काम करावे लागले. मालवाहू ट्रक्स उशिरा पोहोचले.१० नोव्हेंबरला ५१० पीसेस तुमच्या कंपनीकडून मिळाले.ते दुपारी ४.२०ला मिळाले.मालवाहू ट्रक्सच्या उशिरा येण्यामुळे जी परिस्थिती निर्माण झाली होती,त्यावर मात करण्यास तुम्ही आम्हाला जे सहकार्य केलेत त्याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत.माल आमच्यापर्यंत पोहोचवणारे ट्रक्स यापेक्षा लवकर पोहोचण्याची व्यवस्था होऊ शकते का किंवा मालवाहू जहाजातून काही साहित्य सकाळी पाठवता येईल का? अशी काही जलद गतीची व्यवस्था केल्यास तुम्हाला नक्कीच फायदा होईल.


आपला विश्वासू,


एक्स. वाय. झेड.


सुपरिटेंडंट


हे पत्र वाचून झाल्यावर मि.व्हर्मिलेन यांनी (जे झिरेंगाज सन्सचे मॅनेजर होते) ते पत्र माझ्याकडे पाठवले व त्यावर टिप्पणी केली ती अशी "या पत्राची सुरुवातच कोणत्या समस्या येतात हे सांगून केली आहे,ज्यामध्ये आम्हाला मुळीच रस नाही.आमच्याकडून सहकार्याची मागणी करताना आमची कोणती गैरसोय होईल याचा मुळीच विचार केलेला नाही.सगळ्यात शेवटच्या परिच्छेदात आम्ही काय करायला हवे ते सांगितले आहे. जर आम्ही सहकार्य केले,तर फार जलद गतीने माल उतरवता येईल वगैरे ! मालवाहू ट्रक्स ज्या दिवशी डिलीव्हरी देतील त्याच दिवशी पुढे जाऊ शकतील, अशी आम्हाला खात्रीही दिली आहे.


"ज्यामध्ये आम्हाला रस आहे,त्याविषयी अगदी शेवटी सांगितले आहे.त्यामुळे योग्य तो परिणाम साधत नाही. परिणामी मनापासून सहकार्य करावे असे आम्हाला वाटतच नाही."


हेन्री फोर्ड म्हणतो,'आपण एखाद्या घटनेकडे दुसऱ्याच्याही दृष्टिकोनातून बघायला हवे.'


आपण वरील पत्रात दुरुस्ती करून ते पुढीलप्रमाणे लिहू शकतो.अर्थात हे काही आदर्श पत्र नाही,पण निदान त्यात सुधारणा तरी करता येईल,ती अशी-


मि. एडवर्ड व्हर्मिलेन

ए झिरेंगाज सन्स,

२८ फ्रंट स्टेशन,

ब्रुकलिन एन. वाय. ११२०१.


प्रिय व्हर्मिलेन,


गेल्या चौदा वर्षांपासून तुमची कंपनी आमच्या सुप्रतिष्ठित ग्राहकांपैकी एक कंपनी आहे.तुमच्या या सातत्यासाठी आम्ही तुमचे ऋणी आहोत.आमच्याकडून तुम्हाला वेगाने आणि उत्कृष्ट सेवा मिळावी अशी आमची इच्छा आहे;अशी सेवा देणे अशक्य झाले आहे, हे सांगताना आम्हाला वाईट वाटतंय.कारण कामासाठी लागणारे साहित्य उतरवले जात असल्यामुळे संध्याकाळी एकच गडबड उडते.वाहतुकीची कोंडी होते. १० नोव्हेंबरला अगदी हीच गडबड झाली.त्या दिवशी अनेक ट्रक्स उशिरा आल्या.तुमच्यासाठी पाठवलेले ट्रक्स ट्रॅफिकमध्ये फसले व धक्क्यावर अडकले.तुमचे मालवाहू जहाजही त्यामुळे उशिरा निघू शकले.


हे खूपच त्रासदायक आहे,पण आपण ते नक्कीच टाळू शकतो.

सकाळच्या वेळी धक्क्यावर तुमचे साहित्य पोहोचेल अशी व्यवस्था तुम्ही करू शकलात,तर तुमच्या ट्रक्सही वेळेत परत जाऊ शकतील.


अर्थात तुमचे साहित्य येईल तेव्हा नेहमीच आम्ही तयार असू व तुम्हाला वेळेवर योग्य ती सेवा देऊ.


तुम्ही व्यग्र असाल,तर पत्राला प्रत्युत्तर दिले नाही तरी चालेल.


तुमचा विश्वासू,

एक्स. वाय. झेड.

सुपरिटेंडंट


न्यू यॉर्कला बँकेत काम करणारी बार्बरा अ‍ॅण्डरसन नावाची महिला आमच्या कोर्समध्ये येत होती.मुलाच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे तिला फिनिक्स अ‍ॅरिझोना येथे राहायला जाण्याची वेळ आली.कोर्समध्ये पत्र लिहिण्याची कला तिने अवगत केली होती.नोकरीसाठी फिनिक्समधील बारा बँकांना तिने जे पत्र पाठवले,ते असे :


महोदय,


यशस्वी वाटचाल करणाऱ्या आपल्या बँकेला माझा बैंकिंग सेवेतील दहा वर्षांचा प्रदीर्घ अनुभव नक्कीच लाभदायी असेल.


न्यू यॉर्कमधील 'बँकर्स ट्रस्ट कंपनी'मध्ये महत्त्वाच्या पदांवर सेवा दिल्यामुळे मी ब्रँच मॅनेजर झाले.ग्राहकमित्र,कर्ज,

तारणे,व्यवस्थापन अशा सगळ्याच आघाड्यांवर मी काम केले.मी फिनिक्समध्ये ३ एप्रिलपासून राहायला येणार आहे आणि तुमच्या ध्येयसिद्धीच्या यात्रेत तुम्ही मलाही सहभागी करून घेतले,तर मला खूप आनंद होईल !


आपली विश्वासू


                                          बार्बरा एल.अ‍ॅण्डरसन


बार्बराच्या पत्राला प्रतिसाद मिळाला का? होय! अकरा बँकांनी तिला मुलाखतीसाठी आमंत्रित केले.तुला कोणत्या ठिकाणी काम हवंय,हा पर्याय तिला होता. का? कारण मिसेस बार्बरा अ‍ॅण्डरसनने 'मला काय हवे आहे' हे लिहिले नव्हते,तर मी बँकांना कशी मदत करू शकेन,हे लिहिले होते आणि 'त्यांच्या' गरजांना महत्त्व दिले होते,तिच्या नव्हे !


'सेल्स'मध्ये काम करणारे हजारो लोक दिवसभर काम करून थकलेले,निराश झालेले आणि फारच कमी कमवणारे दिसतात.

असे का? कारण ते फक्त 'मला काय हवंय' याचा विचार करतात.

ग्राहकाला काय खरेदी करायची आहे,याचा विचार ते मुळीच करत नाहीत. खरेतर ग्राहकाला काहीच खरेदी करायची नसते.जर करायची असती,तर आपण स्वतः बाहेर जाऊन खरेदी करू;पण तुम्ही आणि मी सतत आपल्या समस्या सोडवण्यात व्यग्र असतो.

जर विक्री क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी…. राहिलेला शिल्लक भाग तिसऱ्या भागात…!!




१७/१/२६

अविस्मरणीय प्रवास / Unforgettable Journey

आजही नेहमीप्रमाणेच दवाखाना आटोपून निघताना घाई झाली होती.गावाकडे परत जाण्यासाठी रेल्वेची वेळ आणि ठिकाण मोबाईल वर तपासून खात्री झाली,की रेल्वे निघण्यास अजून वेळ आहे.पण रिक्षात बसल्यावर वर सुद्धा रेल्वेची माहिती घेणं सुरूच होतं.आजही मी स्टेशनला पोहोचण्या आधीच रेल्वे पोहोचल्याचे लक्षात आले आणि रेल्वे सापडेल का..?या विचाराने ऑटोच्या चाकापेक्षा जास्त गतीने माझ्या डोक्यातील विचार फिरू लागले.


शेवटी एकदाचे रेल्वे स्टेशन आले.लगबगीने तिकीट खिडकीजवळ गेल्यास समजले,की दुसऱ्या एका गाडीच्या क्रॉसिंगमुळे तपोवन गाडीला निघण्यासाठी अजून पाच मिनिटे वेळ आहे.शेवटी क्रॉसिंगला येणाऱ्या गाडीचे मनोमन आभार मानले.आणि तिकीट घेऊन माझ्या गाडीकडे निघाले.

जनरलचा डब्बा धावत धावत शोधून काढला आणि डब्यात चढले.चढताच जागेची शोधाशोध सुरू झाली.एका ठिकाणी जागा दिसली म्हणून तिथे जाऊन बसले.


मला ज्या ठिकाणी जागा भेटली होती त्याच्या बाजूस असणाऱ्या खिडकीजवळ जवळपास साठ वर्षे वय असणारे काका बसलेले होते.माझ्या जवळ असणारी बॅग,बाजूस असणाऱ्या खिडकी जवळच्या कडीला अडकवण्याठी उठून ती अडकवली.


तेवढ्यात माझ्या समोवरील खिडकी जवळच्या सीटवर बसलेल्या काकू बॅगकडे पाहून चिडलेल्या सुरात म्हणाल्या-"ही बॅग कोणी अडकवली ..?ती काढा,माझ्या डोक्याला लागेल.."मग मी त्या काकूंकडे पाहिले तर त्यांनी डोक्याला स्कार्फ बांधला होता.मला वाटले कदाचित खिडकीतून भरभर येणाऱ्या हवेमुळे होणारा त्रास टाळण्यासाठी स्कार्फ बांधला असावा.म्हणून मी काकूंना मी म्हणाले.."इतक्या वर ठेवलेली बॅग तुम्हाला कशी लागेल.." तेंव्हा काकू अजून चिडून म्हणाल्या.."काढा म्हटलं न बॅग." असं म्हणताना त्यांच्या बोलण्यात वैताग जाणवला.आपल्यामुळे दुसऱ्यास त्रास नको म्हणून मी बॅग काढून जवळ घेतली.


माझ्या शेजारी बसलेल्या काकांनी घडलेला सारा प्रकार शांतपणे पाहिला.आणि मला म्हणाले -

"बेटा,ती बॅग इकडे दे मी वर व्यवस्थित ठेऊन देतो.."आणि काकांनी बॅग वर ठेऊन दिली.काकांनी बॅग वर ठेऊन ओझे कमी केले होते म्हणून त्यांचे आभार मानले.पुन्हा काकासोबत मोकळेपणाने गप्पा सुरु झाल्या.काका म्हणाले-


"कुठे गेली होती बेटा" काकांना माहिती सांगितली. तेंव्हा काका म्हणाले "बेटा घाबरायचं नाही,प्रत्येक परिस्थितीत मनाने खंबीर राहून आलेल्या संकटांशी दोन हात करायचे,

आजच्या काळातील प्रत्येक स्त्री ही खंबीरपणे,हिंमतीने प्रत्येक ठिकाणी पुरुषांच्या बरोबरीने काम करत आहे.."असे सांगताना काकांच्या बोलण्याने मला ही बरे वाटले.


काकासोबत बोलताना दवाखाण्याचा विषय निघाल्यास काका म्हणाले "बाळा,दवाखाना कुणाला चुकला आहे..."

आणि काका पुढं त्यांची जीवन कहाणी सांगतच गेले.."

समोरच्या सीटवर बसलेल्या डोक्यास स्कार्फ बांधून बसलेल्या काकूंकडे इशारा करून ती माझी पत्नी आहे म्हणून ओळख करून दिली.आणि काका सांगू लागले,की "आम्ही पण मुंबईला दवाखान्यातच गेलो होतो.


मागील पंधरा दिवसापासून दवाखान्यातच शरीक होतो...

आता आम्ही परत घरी जात आहोत.पुन्हा पंधरा दिवसांनी मुंबईला दवाखान्यात जायचे आहे.माझं गाव हिंगोली जिल्ह्यात आहे,दर पंधरा दिवसांनी एवढा प्रवास करताना खूप शारीरिक व मानसिक थकवा येतो.."काका बोलत असताना खूप भावनिक होत गेले होते...आणि पुन्हा पुढे सांगू लागले की.."माझी पत्नी कर्करोगाच्या आजाराने ग्रस्त आहे.तिच्या उपचारासाठी आम्हाला सारखं दवाखान्यात जावं लागतंय..महिन्यातील थोडे दिवस घरी आणि जास्त काळ दवाखान्यात घालवावा लागतो."


ऐकताना माझ्या मनाला खूप वाईट वाटले.मी पुढे विचारले की "तुम्हाला  किती मुलं आहेत,ते सोबत येत नाहीत का..'?काका सांगत होते की "मला दोन मुली आहेत,मुली काय मुलांपेक्षा कमी आहेत का म्हणून दोन मुलींवरच कुटुंब नियोजन केले.दोनीही मुलींना खूप शिकवले.एक मुलगी डॉक्टर असून ती अमेरिकेत स्थायिक झाली आहे.तर दुसरी मुलगी तामिळनाडू राज्यात न्यायाधीश आहे.दोघीही आपापल्या संसारात मग्न आहेत.दोघीही आमच्यापासून दूर असल्याने त्यांना आमच्याकडे येणं शक्य होतं नाही.यामुळे आमच्या दोघांचीही काळजी एकमेकांनाच घ्यावी लागते."


मी विचारले तुमच्या घरातील कामे कोण करत असतंय. काका म्हणाले-"माझी पत्नीच सारे काम करत असते.ती शरीराने गंभीर असूनही मनाने खंबीर असल्याने एवढा दुर्धर आजार असूनही घरी गेल्याबरोबर कामाला लागते.सर्व काम तीच करते.तिचा जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन असल्याने काहीही न झाल्यासारखे वागत असते.

कोणताही ताण घेत नाही.यामुळेच तर ती शरीरावर  वेगवेगळ्या थेरपी होऊन सुद्धा,काहीही न झाल्याप्रमाणे राहण्याचा प्रयत्न करते. स्वतःसहित माझी काळजी घेते." काहीवेळा पूर्वी घडलेला प्रकार ते सांगू लागले..."तू येण्यापूर्वी माझ्या बाजूला एक बाई बसली होती.तीला खिडकीतून कोणीतरी चहा देत होते.चहा घेतेवेळी कप निसटून तो माझ्या पायावर पडला.ते माझ्या पत्नीने पाहिले यामुळे ती चहा विक्री करणाऱ्यांवर खूप चिडली व त्यास रागाने म्हणाली-चहा आत आणून दे बाहेरून का देतोस..?माझ्या नवऱ्याच्या पायावर चहा पडला.त्यामुळे त्यांचा पाय भाजला असता तर…

माझी कोण काळजी घेईल...मला त्यांच्याशिवाय कोण आहे...,फक्त मला दुःखात पाहून ती खूप अस्वस्थ होते.त्यामुळे तिची चिडचिड होते."

   

 बोलत असताना काकांचे शब्द जड होत जात होते.आजवर आलेल्या नात्यागोत्यातील वाईट अनुभवावरून काका सांगत होते.."पैसा- संपत्ती साठी सर्वजण जमा होतात,पण दुखसमयी,संकटकाळात फक्त पती-पत्नीच एकमेकांना साथ देतात.आम्ही दोघेच एकमेकांची काळजी घेतो....

बेटा तिच्यावर होणाऱ्या वेगवेगळ्या थेरपीमूळे तिच्या डोक्यावरील सर्व केस काढलेले आहेत.


त्यामुळे तिच्याजवळ अडकवलेल्या बॅगमुळे ती तुझ्यावर चिडली होती...बाकी काही नाही.."हे ऐकून मला फार वाईट वाटले,माझ्यामुळे काकूंना त्रास झाला या गोष्टीचा पश्चाताप झाला...मी काका कडे दिलगिरी व्यक्त केली.

   

आमचा सोबतचा प्रवास संपला होता पण हे जोडपे मात्र मनात बसले होते...मुलं बाळं असूनही आज त्यांच्याजवळ कोणीच नव्हते...यामुळे माझ्या मनालाही खूप वाईट वाटत होते...पण ते दोघेजण मिळून एकमेकांच्या सुख दुःखावर प्रेम,माया,ममतेची फुंकर घालून...प्रत्येक क्षण आनंदाने जगण्याचा प्रयत्न करत होते...कदाचित ते मनातल्या मनात गुणगुणत असतील....



'तेरा साथ है,तो मुझे क्या कमी है,

अंधेरो से भी मिल रही रोशनी है..'

तेरा साथ है तो कुछ भी नहि है तो,

कोई गम नही है...'..



 ही छोटी कथा इथे संपते पण आयुष्याचा विचार करायला लावते.विजय गायकवाड,ही कथा सौ.मंगल माधव गव्हाणे,सेलू यांनी लिहिली आहे.



किंमत


"दुकानात सफाई कामासाठी त्वरीत मुलगा पाहिजे"

अशी पाटी वाचून तो दुकानात शिरायला लागला तसं सिक्युरिटी गार्डने त्याला अडवलं.


"काय पाहिजे?"


त्याने शांततेने बोर्डाकडे बोट दाखवलं.गार्ड समजला.आत हात दाखवून म्हणाला.


" राजू शेठ समोरच बसलेत त्यांना भेटून घे"

अस्वस्थ मनाने तो आत शिरला.समोरच काऊंटरवर राजूशेठ कस्टमरकडून पैसे घेण्यात गुंतले होते.कस्टमर गेल्यावर त्यांची नजर त्याच्यावर पडली.


"बोला"

" ते...तुम्हांला सफाईकामासाठी मुलगा पाहिजे आहे ना?"

" हो.तू करणार आहेस का?"


त्याने मान डोलावली.राजूशेठने त्याच्याकडे निरखून पाहिलं.पंधरासोळा वर्षाचा गोरागोमटा स्मार्ट मुलगा.कपडे मात्र साधारण होते.दुकानाच्या सफाईकामासाठी योग्य आहे असं त्यांना वाटेना पण तीन दिवसापासून सफाईसाठी माणूस नव्हता.त्यामुळे दारी आलेल्या माणसाला परत पाठवणे त्यांना योग्य वाटत नव्हतं.


"तुझं नांव?"

"प्रदीप"

"वडील काय करतात?"

"रिक्षा चालवतात"

"कुठे रहातोस?"

"समता नगर"


"ठिक आहे .तीन हजार देऊ तुला महिन्याला.खाडे करायचे नाहीत.खाड्याचे पैसे आम्ही कापून घेतो"

" हो चालेल" तो म्हणाला


तेवढ्यात ग्राहक आल्यामुळे राजशेठ ओरडून म्हणाले "अरे भास्कर.याला दुकान दाखवून दे.काम समजावून सांग"

भास्कर आला.त्याने प्रदीपला ते तीन मजली भव्य दुकान दाखवलंः


" तुला सकाळी आठ वाजताच यावं लागेल.फ्लोरींग,काचेची कपाटं,काऊंटर्स,वाँशरुम सगळं साफ करावं लागेल.हे कपड्याचं दुकान आहे.इथे थोडीही धुळ चालत नाही. ग्राहक येतांना धुळ घेऊन येतात.त्यामुळे वारंवार झाडू मारणं,कपड्याने पुसणं करावं लागतं.रात्री आठनंतरच तुला घरी जाता येईल"

प्रदीपने मान डोलावली.


"जा आता.सकाळी आठ वाजताच ये"

प्रदीप गेला.त्याला जातांना पाहून राजूशेठला परत एकदा तो सफाईकामाला योग्य नाही असंच वाटून गेलं.

"ठिक आहे.पाहू दोनचार दिवस.नाही पटला तर हाकलून देऊ" ते मनाशीच बोलले.


प्रदीप दुसऱ्या दिवशी आला.त्याने काम करायला सुरुवात केली पण त्याने कधीच सफाईचं काम केलेलं नाही हे त्याच्यासोबत आलेल्या नोकरांच्या लक्षात आलं.ते त्याला वारंवार सुचना देऊ लागले.दहा वाजले.

दुकान उघडण्याची वेळ आली तरी त्याची सफाई झाली नव्हती.ते तरी बरं शेठ अकरा वाजता यायचे.नाहीतर त्यांनी प्रदीपला फाडून खाल्लं असतं.दुकान सुरु झालं.साडेअकराला भास्कर वाँशरुमकडे जायला निघाला तर वाँशरुमच्या दाराजवळ बसून प्रदीप रडत होता.


"काय रे काय झालं?का रडतोय?"

"नाही.काही नाही" प्रदीपने डोळे पुसले

" तुला काम जमत नाही असं मनोज सांगत होता.कधी काम केलं नाही वाटतं?"

"नाही"

"गरीबी वाईट असते बाबा.काहीही कामं करायला लावते.जमेल जमेल.तीन चार दिवस हाल होतील.मग सवय होऊन जाईल.काही रडू नको.घरी कोण काम करतं?"


" आई आणि बहिण"

" तरीच.कळलं ना कसा त्रास होतो ते?"

प्रदीपने मान डोलावली.


दुपारी भास्कर कस्टमर नाही असं पाहून जेवायला बसला त्याचं लक्ष प्रदीपकडे गेलं.

" काय रे जेवायचं नाही का?"

प्रदीपने नकारार्थी मान हलवली.

"का?डबा नाही आणला का?"

" नाही"

" ये मग इकडे.आपण दोघंही जेवू"

" नको.मला भुक नाहिये"

"अशी कशी भुक नाही.सकाळपासून काम करतोय.चल मुकाट्याने ये खायला"


तेवढ्यात दोन सेल्समनही डबा घेऊन आले.प्रदिपचा डबा नाही हे पाहून त्यांनी भाजी आणि दोन दोन पोळ्या  प्रदिपला एका ताटलीत काढून दिल्या.भुक नाही म्हणणाऱ्या प्रदीपने पाच पोळ्या खाल्ल्या.


"उद्यापासून डबा आणत जा.काय!" भास्करने दम भरला.

"ते...आई आजारी असते त्यामुळे आणता येत नाही"

तिघा सेल्समननी एकमेकांकडे पाहिलं.एक जण म्हणाला

" काळजी करु नको.आम्ही आणत जाऊ तुझ्यासाठी पण" प्रदीप काही बोलला नाही.पण त्याचे डोळे भरुन आल्याचं भास्करच्या लक्षात आलं.


चारपाच दिवस प्रदीपला काम जमत नाहिये हे पाहून बाकीच्या सेल्समननी त्याला बरीच मदत केली.कुणी काऊंटर पुसून घेतले,कुणी काचेची कपाटं साफ केली,

तर कुणी पंखे,लाईटस.आठवडाभरात प्रदिपला बऱ्यापैकी काम जमायला लागलं.पण बाकीच्यांनी मदत करणं सोडलं नाही.राजूशेठला ही गोष्ट माहित नव्हती त्यामुळे प्रदीपच्या कामावर ते समाधानी होते.भास्करला त्यांनी दोनतीनदा त्याच्याबद्दल विचारलं तेव्हा भास्कर म्हणाला "चांगला आहे पोरगा कामाला.मेहनती आहे."

लग्नाचा सिझन होता.ग्राहकांची वर्दळ प्रचंड वाढली.

प्रदीपचं कामही वाढलं.वारंवार दुकान झाडणं,पुसणं यात दिवस कसा निघून जायचा कळायचं नाही.पंधरा दिवस झाले आणि अबोल प्रदीप दुकानात रुळला.आता तो मोकळेपणाने बोलत होता.फुरसत असली की तो सेल्समनना मदत करायचा.ढिगाने पडलेल्या साड्या,

बेडशीट्सच्या घड्या करुन ठेवायचा.ग्राहकांना पसंत न पडलेले रेडिमेड कपडे बाँक्सेसमध्ये व्यवस्थित पँक करुन ठेवायचा.त्याच्या या मदतीमुळे सेल्समन त्याच्यावर खुष होते.


महिना झाला.राजूशेठने प्रदीपच्या हातात तीन हजार ठेवले तेव्हा प्रदिपचे डोळे भरुन आल्याचं त्यांना जाणवलं.


" काय रे काय झालं?"

" काही नाही.पहिला पगार आहे ना म्हणून..."

त्याने डोळे पुसले.शेठजींना आठवलं या महिन्यात प्रदिपने एकही दिवस खाडा केला नव्हता.उलट सिझनमुळे कधी रविवारीही दुकान सुरु असायचं तेव्हा तो स्वतःहून दुकानात येऊन काम करायचा.त्याच्या कामावर खुष होऊन राजूशेठने त्याचा पगार चार हजार करायचं ठरवलं.


सोमवार उजाडला.राजूशेठ दुकानात आले.देवांच्या फोटोंची पुजा करुन ते कँशकाऊंटरवर बसत नाही तोच प्रदीप त्यांच्याकडे आला.नमस्कार करुन म्हणाला.


"शेठजी माझे बारावीचे क्लासेस पुढच्या 

आठवड्यापासून सुरु होताहेत तर मी हा आठवडाच काम करु शकणार आहे"

शेठजींना धक्का बसला.


"अरे पण तू दुकानात काम करुनही क्लासेस करु शकतो.संध्याकाळी लवकर सोडत जाऊ आपण तुला"

"नाही शेठजी.क्लासेस सकाळी आणि संध्याकाळीही असतात"


आता मात्र शेठजी रागावले.आता पुन्हा दुकानाच्या सफाईसाठी मुलगा बघणं आलं.याच गोष्टीचा त्यांना तिटकारा होता.पैसा देऊनही माणसं टिकायची नाही.

काही तर अँडवान्स घेऊन पळून जायची.दुकान चालेल की नाही यापेक्षा माणसं टिकतील की नाही याचीच चिंता शेठजींना लागून रहायची.प्रदिप टिकेल असं त्यांना वाटत होतं.शिवाय त्याचं कामंही त्यांना आवडलं होतं.

"तुला असं एकच महिना काम करायचं होतं तर तसं बोलला का नाहीस.आता या आठदहा दिवसाचा पगार तुला मिळणार नाही आणि नवीन माणूस येईपर्यंत तुला काम करावन लागेल"ते रागावून म्हणाले.


प्रदीप हसला

"काही हरकत नाही शेठजी.तुम्हांला माणूस मिळेपर्यंत मी दुकान सोडून जाणार नाही."


शेठजींना आश्चर्य वाटलं.एक एक दिवसाच्या पगारासाठी भांडणारी,खाड्याचे पैसे कापले म्हणून वादविवाद घालणारी माणसं त्यांनी बघितली होती.या पोराने तर सहजगत्या त्यावर पाणी सोडलं होतं.तरुण पोरांना अशीही पैशांची किंमत असते कुठे?


नशिबाने शेठजींना दुसरा माणूस लगेच मिळाला.पण तो चार हजार पगारावर अडून बसला.शेवटी राजूशेठना त्याचं ऐकावं लागलं.येत्या सोमवारपासून तो कामावर येणार होता.


सोमवार उजाडला.शेठजी दुकानात आले.अजून ग्राहकांची वर्दळ सुरु व्हायची होती.प्रदीपला आलेला पाहून  त्यांना आश्चर्य वाटलं

"काय रे विचार बदलला की काय तुझा?"

प्रदीप हसून म्हणाला

"नाही शेठजी.या नवीन दादांना काम समजावून सांगायला आणि सगळ्यांना शेवटचं भेटून घ्यायला आलोय"

" बरं बरं" 


प्रदीप आणि तो नवीन माणूस आत गेला.शेठजी खुर्चीवर बसत नाही तोच एक आलिशान कार दुकानासमोर उभी राहिली.आजची सकाळ एका दांडग्या ग्राहकाने सुरु होणार याचा शेठजींना आनंद झाला.


" बोला साहेब "

ती व्यक्ती आत आल्यावर शेठजी म्हणाले

" प्रदीपला घ्यायला आलोय."

शेठजींनी एकदा कारकडे पाहिलं.एका मामुली सफाईकामगाराला घेण्यासाठी हा रुबाबदार माणूस एवढी आलिशान कार घेऊन यावा.या माणसाकडे तर प्रदीप कामाला लागला नाही?


"प्रदीप तुमच्याकडे कामाला लागला की काय?"त्यांनी साशंक मनाने विचारलं

" नाही नाही.प्रदीप मुलगा आहे माझा"

"काय्यsssप्रदीप तुमचा मुलगा आहे?"

तेवढ्यात प्रदीप बाहेर आला.आल्याआल्या त्याने वेगाने धावत जाऊन त्या माणसाला मिठी मारली

" पप्पाsss" 

त्या माणसाने त्याला मिठीत घेतलं आणि तो ढसाढसा रडू लागला.सगळे सेल्समन,नोकर जमा झाले.प्रदीपही रडत होता.हे काय गौडबंगाल आहे हे कुणाला कळेना.थोडा वेळाने प्रदीप जरा बाजुला झाला तसा तो माणूस म्हणाला.


" शेठजी मी ओंकारनाथ.माझी धुळ्यात चटईची फँक्टरी आहे.दोन इंडस्ट्रीयल वर्कशाँप आहेत.अगोदर मीही एक कामगार होतो.मेहनतीने आणि देवक्रुपेने फँक्टरीचा मालक झालो.मी गरीबी पाहिली आहे.कित्येक दिवस उपाशी राहून आयुष्य काढलं आहे.पण आमची मुलं तोंडात चांदीचा चमचा घेऊन जन्माला आलीत.त्यांना पैशाची,श्रमाची कसली आलीये किंमत?हा माझा अति लाडावलेला मुलगा माझ्या फँक्टरीत यायचा.तिथल्या कामगारांवर रुबाब करायचा.लहानमोठा बघायचा नाही.वाटेल ते बोलायचा.माझ्या कानावर आलं होतं पण एकूलत्या एक मुलावरच्या प्रेमापोटी मी चुप बसायचो.


एक दिवस त्याने मर्यादा सोडली.आमच्या सफाई कामगाराला वाँशरुम नीट साफ केलं नाही म्हणून सगळ्या कामगारांसमोर शिव्या दिल्या.साठी उलटलेला तो माणूस.त्याच्या मनाला ते लागलं.तो माझ्याकडे रडत आला आणि "माझा हिशोब करुन टाका.मला आता इथे रहायचं नाही "असं म्हणू लागला.माझं डोकं सरकलं.मी याला बोलावलं.म्हाताऱ्याची माफी मागायला लावली तर हा आपल्या मस्तीत.सरळ माफी मागणार नाही म्हणाला.मी उठून त्याच्या मुस्काटात मारली आणि त्याला म्हणालो की तुझ्यात एवढी मग्रुरी आहे ना तर तू मला महिनाभर सफाईचं काम करुनच दाखव.त्याने माझं चँलेंज स्विकारलं पण आपल्याच फँक्टरीत सफाई करण्याची त्याला लाज वाटत होती.मला म्हणाला मी जळगांवला जातो आणि तिथे काम पहातो.मीही संतापात होतो म्हणालो "तू कुठेही जा.पण हेच काम करायचं आणि महिन्याने मला सांगायचं कसं वाटतं ते.आणि हो,तुझं खाणं पिणं,रहाणं सगळं तू तुझं बघायचं.मी त्यासाठी एक पैसा तुला देणार नाही "त्याच्या एका गरीब शाळकरी मित्राचा मित्र  जळगांवच्या समता नगरात रहातो.त्याच्याकडे तो आला.तुमच्या दुकानात कामाला लागला.मला फोन करुन त्याने हे सांगितलं.मला वाईट वाटलं.

शेवटी बापाचं मन ते.पण म्हंटलं उतरु द्या याची मस्ती.अशीही त्याला सुटीच होती.रिकाम्या टवाळक्या करण्यापेक्षा आयुष्य किती खडतर आहे हे तरी शिकेल.म्हणून मी काहीही चौकशी केली नाही.मागच्या आठवड्यात त्याचा फोन आला खुप रडला.म्हणाला 'मी आता खुप सुधारलो आहे.मी आठवड्याने परत येतो घरी' मी म्हंटलं 'मीच येतो.बघतो तुझं दुकान आणि तू कायकाय काम करत होता ते' म्हणून आज मी ते बघायला आणि त्याला घ्यायला आलोय."


राजूशेठ ते ऐकून अवाक झाले. म्हणाले

" तरीच मला वाटत होतं की हा मुलगा सफाईच्या कामाला योग्य नाहिये.पण हा काम तर छान करत होता"


प्रदीप हसला


"नाही शेठजी.मला सुरवातीला काम जमत नव्हतं पण या सगळ्या काकांनी मला खुप मदत केली.मी डबा आणत नव्हतो कारण मित्राची आई खरंच आजारी असायची पण महिनाभर यांनी त्यांच्या घासातला घास मला भरवला.माझ्याकडून खुप चुका व्हायच्या पण ते माझ्यावर कधी रागावले नाहीत.मला त्यांनी सांभाळून घेतलं"


प्रदीप परत रडायला लागला तसं भास्करने त्याला जवळ घेतलं.


"अरे बेटा आपण सगळेच पोटापाण्यासाठी नोकरी करतो ना?मग आपण एकमेकांना सांभाळून घ्यायला नको?"


" हो काका.पण मला हे समजत नव्हतं.आता ते कळायला लागलं.पप्पा तुम्ही मला म्हणत होते ना की मला पैशाची,श्रमांची किंमत नाही म्हणून.मला इथं आल्यावर मेहनतीची,पैशांची,

माणसांची,अन्नाची सगळ्यांची किंमत कळायला लागली.पप्पा शेठजींचंच पहा ना!त्यांची तीन मोठी दुकानं आहेत जळगांवात. पण त्यांना कसलाही गर्व नाही.ते कुणाशीच कधीही वाईट वागले नाहीत.त्याच्या घरी काहीही कार्यक्रम झाला की ते दुकानात सगळ्यांना मिठाई वाटायचे"

"बेटा हेच मला हवं होतं.तुला ते कळलं यातच मला समाधान वाटतंय" 


" चला साहेब तुम्हांला दुकान दाखवतो" राजूशेठ प्रदीपच्या वडिलांना म्हणाले "आणि भास्कर जरा सगळ्यांसाठी मिठाई घेऊन यायला सांग.आज एक बिघडलेला मुलगा माणसात आला याचा मलाही खुप आनंद होतोय" 


"शेठजी एक विनंती आहे "भास्कर म्हणाला

" हं बोल"

"आमच्या सगळ्या सेल्समनकडून प्रदीपला पँटशर्टचं कापड द्यायचं म्हणतोय.त्याचे पैसे आमच्या पगारातून कापून घ्या"


"अरे वा!चालेल.मग अजून एक काम कर,प्रदीपला त्याच्या आवडीचा एक टि शर्ट काढून दे.माझ्याकडून प्रदीपला गिफ्ट"


ते भव्य दुकान पाहून प्रदीपच्या वडिलांना प्रदीपच्या मेहनतीची कल्पना आली.मिठाई खाऊन झाल्यावर ते म्हणाले.


"चला मंडळी.आता निघायची वेळ आली.तुम्ही सर्वांनी माझ्या या नाठाळ मुलाला सांभाळून घेतलं त्याबद्दल तुमचे मनापासून आभार.आणि हो पुढच्या महिन्यात प्रदीपचा वाढदिवस आहे.तुम्ही सगळ्यांनी धुळ्याला पार्टीला जरुर यायचं आहे.गाडी करुनच या सगळे.खर्चाची काळजी करु नका.गाडीचा खर्च मी करेन."


प्रदीप उठला.सगळ्या सेल्समन आणि नोकरांच्या पाया पडला.सगळ्यांनी मिळून त्याला पँटशर्टचं कापड दिलं.मग शेठजींच्या पाया पडायला आला तसं शेठजी त्याला जवळ घेऊन आणि त्याच्या हातात टि शर्ट देऊन म्हणाले


"बेटा तुझ्या वडिलांनी आणि तु ही नव्या पिढीसाठी एक आदर्श घालून दिलाय.भावी आयुष्यासाठी तुला खुप खुप शुभेच्छा"


प्रदीप आणि त्याचे वडील गाडीत जाऊन बसले तसे सर्व सेल्समन उदास मनाने त्यांना निरोप द्यायला बाहेर आले.गाडी निघाली.

निरोपाचे हात हलले.प्रत्येकजण आत येऊन आपापल्या कामाला लागला.शेठजींना काऊंटर बसल्यावर आपल्या अशाच बिघडलेल्या मुलाची आठवण झाली. सध्या तो पुण्यात इंजीनियरींग करत होता.तो करत असलेले रंगढंग,त्याला लागलेली व्यसनं त्यांच्या कानावर आली होती.त्याला सुधारण्यासाठी प्रदीपसारखं काही करता येईल का याच्या विचारात ते गढून गेले.


© दीपक तांबोळी यांनी लिहिलेली विनायक पाटील कोल्हापूर यांनी मला व्हाट्सअप द्वारे पाठवलेली.

      




१५/१/२६

तुमच्यासोबत जग आहे.The world is with you.

उन्हाळ्यात मी बरेचदा मेन नदीवर मासे पकडायला जात असे.व्यक्तिशः मला स्ट्रॉबेरी आणि क्रीम फार आवडते.पण मला असे आढळून आले आहे की कुठल्यातरी अजब कारणासाठी माशांना किडे आवडतात.म्हणून मी जेव्हा मासे पकडायला जातो तेव्हा तेव्हा मला काय आवडते यावर मी विचार करत नाही.मी गळाला स्ट्रॉबेरी आणि क्रीमचे आमिष लावत नाही.त्याऐवजी मी माशासमोर आळी लटकावून विचारतो,"तुला हे खायला आवडेल ना?"


तर मग लोकांना आकर्षित करायला आम्हीसुद्धा हाच कॉमनसेन्स वापरून,प्रयोग का नाही करून पाहत ?


ग्रेट ब्रिटनचे प्रधानमंत्री लॉईड जॉर्ज यांनी पहिल्या महायुध्दात हेच केले.जेव्हा कुणीतरी विचारले की युध्दकाळातील अन्य नेते - विल्सन,ऑरलैंडो आणि क्लीमेंचू या सर्वांचे लोकांना विस्मरण झाले,पण जॉर्ज कसे काय सत्तेत टिकून राहिले? तेव्हा त्यांनी छान उत्तर दिले.त्यांचे उत्तर होते,माशाला कुठल्या प्रकारचं आमिष दाखवून गळाला लावायचे हे त्यांनी शिकून घेतले होते.


आम्हाला काय आवडते या बाबतीत बोलून काय फायदा? हा तर बालिशपणा आहे.मूर्खपणा आहे. तुम्हाला जे आवडते त्यात तुम्हाला रस आहे,हे तर उघडच आहे.अगदी गहरी आणि जबरदस्त रूची आहे. परंतु इतरांना त्यात रूची नाहीए.आम्ही सर्वच स्वतः

मध्येच रस घेतो.म्हणून या जगात लोकांना प्रभावित करण्याचा एकमेव उपाय म्हणजे तुम्ही समोरच्या माणसाच्या आवडीप्रमाणे बोला आणि हे सांगा की तो आपल्या इच्छा कशा त-हेने पूर्ण करू शकतो. ( जो हे करू शकतो त्याच्याबरोबर जग आहे जो हे करू शकणार नाही तो एकटा पडेल." मित्र जोडा आणि प्रभावशाली बना डेल कार्नेगी,मंजुल प्रकाशन )


जर तुम्ही उद्या कुणाकडून काम करवून घेऊ पाहाल,तर ही गोष्ट ध्यानात ठेवा.उदाहरणार्थ,जर तुम्हाला तुमच्या मुलांनी सिगरेट पिणे सोडावे असे वाटत असेल तर तुम्ही त्यांना रागावू नका,त्यांना भाषण देऊ नका आणि तुम्हाला काय हवे आहे हेसुद्धा सांगू नका.याऐवजी त्यांना हे समजवा,की जर ते सिगरेट ओढतील तर ते कधी बास्केटबॉल टीममध्ये सामील होऊ शकणार नाहीत किंवा अ‍ॅथलेटिक्समध्ये कप जिंकू शकणार नाहीत.


तुम्ही तुमच्या मुलांबरोबर व्यवहार करीत असाल किंवा गुरांशी किंवा अगदी चिंपांझीशी,तरी तुम्हाला ही गोष्ट नेहमी ध्यानात ठेवली पाहिजे.उदाहरणार्थ,एक दिवस राल्फ वॉल्डो इमर्सन आणि त्यांचा मुलगा एका पिल्लाला तबेल्यात घेऊन जाण्याचा प्रयत्न करीत होते.परंतु त्यांनी स्वतःच्याच मनाप्रमाणे विचार करण्याची नेहमीची चूक केली.इमर्सन पिलाला धक्का मारत होते आणि मुलगा खेचत होता.पण पिल्लू तेच करीत होते जे ते लोक करीत होते.तोसुद्धा केवळ आपल्या मनाप्रमाणेच वागत होता.म्हणून त्याने आपले पाय ठामपणे जमिनीवर रोवले होते आणि मैदान सोडून तबेल्याकडे जायला तो राजी झाला नाही.त्यांच्या आयरिश सेविकेने हे दृश्य बघितले.तिला निबंध आणि पुस्तके तर लिहिता येत नव्हती,परंतु निदान या प्रसंगात तरी तिच्याकडे इमर्सनपेक्षा जास्त कॉमन सेन्स होता. तिने असा विचार केला की पिल्लाला काय हवे आहे, म्हणून तिने आपले बोट पिल्लाच्या तोंडात ठेवले.पिल्लू ते बोट मजेत चोखू लागलं व तिच्या मागोमाग तबेल्यात चालू लागलं.जेव्हा पासून तुमचा जन्म झाला आहे तेव्हापासून तुम्ही जे काही केले आहे ते यासाठी केलेय,की तुम्हाला काही ना काही तरी प्राप्त करायचे आहे.तुम्ही रेडक्रॉसला जी वर्गणी दिली होती तीसुद्धा या नियमाला अपवाद नाही आहे. तुम्ही वर्गणी यासाठी दिलीत,कारण तुम्हाला लोकांना मदत करायची होती,तुम्ही एक सुंदर, निःस्वार्थ,दैवी कार्य करू इच्छित होतात.


इतरांना मदत करण्याची तुमच्या मनातली इच्छा तुमच्या पैशाच्या लालसेपेक्षा जास्त नसती तर तुम्ही हे केले नसते.असेही होऊ शकते की तुम्ही ही वर्गणी यासाठी दिली असेल कारण तुम्हाला लाज वाटत असेल किंवा एखाद्या ग्राहकाने तुम्हाला असे करायला म्हटले असेल. पण एक गोष्ट तर नक्की आहे.तुम्ही रेडक्रॉसला दान दिले कारण तुम्हाला काहीतरी हवे आहे.


इन्फ्लुएन्सिंग ह्युमन बिहेवियर या सुप्रसिद्ध पुस्तकात हेन्री ए.ओव्हरस्ट्रीटने लिहिले आहे :'कर्म जन्माला येते ते माणसाच्या मूलभूत इच्छेमुळे.व्यवसाय,घर,शाळा आणि राजनीतीमध्ये दुसऱ्यांना कार्य करण्यासाठी प्रेरित करणाऱ्या लोकांना सर्वोत्तम सल्ला हाच दिला जाऊ शकतो:सर्वांत आधी समोरच्या व्यक्तीमध्ये काम करण्याची प्रबळ इच्छा जागृत करा.जो हे करू शकतो त्याच्याबरोबर पूर्ण दुनिया आहे.जो हे नाही करू शकत, तो एकटा पडणार.'


अँड्रयु कार्नेगी गरिबीत वाढलेले स्कॉटलँडचे एक किशोर होते,

ज्यांनी आपल्या नोकरीची सुरुवात दोन सेंट प्रति तासाच्या कामाने केली होती आणि नंतर त्यांनी ३६५ लक्ष डॉलर्स दान दिले.त्यांनी जीवनाच्या आरंभालाच शिकून घेतले होते,की लोकांना प्रभावित करण्याचा एकमेव उपाय समोरच्याच्या इच्छेनुसार गोष्टी करणे हाच होय.ते केवळ चार वर्षेच शाळेत गेले होते,परंतु त्यांनी हे शिकून घेतले होते की लोकांशी कसा व्यवहार करायचा.


एकदा असे झाले की त्यांची एक नातलग स्त्री आपल्या दोन मुलांबाबत खूपच त्रस्त होती.ते येलमध्ये होते आणि इतके व्यग्र होते,की त्यांना घरी पत्र लिहिण्याची फुरसतच मिळत नसे.इतकेच नव्हे तर ते आपल्या चिंतित आईच्या पत्रांना उत्तरसुद्धा लिहीत नसत.हे ऐकल्यावर कार्नेगीने शंभर डॉलर्सची शर्यत लावली की ते उलट टपालाने आपल्या पत्राचे उत्तर मागवूनच दाखवतील आणि गंमतीची गोष्ट ही आहे,की ते उत्तर द्यायचा आग्रहसुद्धा करणार नाही.जेव्हा शर्यत लागली तेव्हा कार्नेगीने आपल्या भाच्यांना एक हलकेफुलके पत्र लिहिले आणि मागून लिहिले की ते प्रत्येकाला पाच डॉलर्सची नोट पत्राबरोबर पाठवताहेत.


परंतु कार्नेगीने पत्राबरोबर नोटा पाठवण्याचे कष्ट घेतले नाहीत.परतीच्या टपालाने त्यांच्या पत्राचे खरेच उत्तर आले,ज्यात 'प्रिय काका अँड्रयु'ला धन्यवाद दिले होते आणि तुम्हाला हे कळलेच असेल की त्यानंतर त्यांनी काय लिहिले असेल.


आपले म्हणणे खरे करण्याचे अजून एक उदाहरण क्लीव्हलँड,

ओहियोच्या स्टॅन नोव्हॅकचे आहे,ज्याने आमच्या वर्गात भाग घेतला.स्टॅन एक दिवस संध्याकाळी घरी परतले.तेव्हा त्यांनी पाहिले की त्यांचा सर्वांत धाकटा मुलगा टिम दिवाणखान्यात फरशीवर बसून,हातपाय आपटत जोराने किंचाळत होता.त्याला दुसऱ्या दिवशी बालवाडीत जाणे सुरू करायचे होते आणि त्याला शाळेत मुळीच जायचे नव्हते.स्टॅनची सामान्य प्रतिक्रिया ही झाली असती की मुलाला त्याच्या खोलीत पाठवून देणे आणि त्याला कडक शब्दात सांगणे की त्याला उद्या शाळेत जायचेच आहे.त्याला शाळेत जायची तयारी करायलाच हवी.त्याच्यापाशी दुसरा उपाय नव्हता.परंतु त्या संध्याकाळी त्याला हे जाणवले,की जर असे केले तर टिम योग्य मानसिकतेसह शाळेत जाणार नाही. म्हणून स्टॅन बसून विचार करू लागला,'जर मी टिम असतो,तर मी शाळेत जायला का बरे उत्साहित असतो?' त्याने व त्याच्या पत्नीने काही अशी मजेदार वस्तुंची यादी बनवली ज्यात मुलाला रस होता; उदा.फिंगर पेटिंग,सिंगिंग,नवीन मित्र जोडणे.या विचारानुसार त्यांनी काम केलं.सगळ्यात आधी त्यांनी जेवणाच्या टेबलावर फिंगर पेटिंग करायला सुरुवात केली.यात माझी पत्नी लिल,माझा मोठा मुलगा बॉब आणि स्वतः मला,खूपच मजा येत होती.थोड्याच वेळात टिमने दारातून डोकावलं आणि काही वेळानंतर त्यांनी आम्हाला आग्रहाने म्हटलं,की आम्ही त्याला या खेळात सामील करून घ्यावं."बेटा,तुला फिंगरपेंट करणं शिकण्यासाठी आधी किंडर गार्टनला जावं लागेल." माझ्या आवाजात पूर्ण उत्साह भरून मी त्या विषयाला धरून त्याच्या भाषेत त्याला समजेल असं सांगत राहिलो,की किंडर गार्टनमध्ये जाण्यामुळे त्याला किती मजेदार गोष्टी शिकता येतील.दुसऱ्या दिवशी पहाटे मी लवकरच जागा झालो.मला वाटलं की मीच सगळ्यांत आधी उठलो आहे.

पण खाली जाऊन बघितलं तर टिम लिविंग रूममधल्या खुर्चीत बसल्या बसल्याच झोपला होता. "तू इथे काय करतोएस?" मी विचारलं."मी किंडर गार्टनमध्ये जायची वाट बघतोय.उगीचच उशीर व्हायला नको." हे त्याचं उत्तर होतं.आमच्या पूर्ण कुटुंबाच्या सहकार्यामुळे टिममध्ये जी प्रबळ इच्छा निर्माण होऊ शकली,ती त्याला धमकी किंवा उगाचच समजवण्याने मुळीच होऊ शकली नसती.तुम्हाला उद्या कोणाच्या मनात प्रबळ इच्छा निर्माण करायची असेल,तर एखादी गोष्ट स्वतःला विचारा,'मी त्याच्या किंवा तिच्या मनात या गोष्टीबद्दल रूची कशी निर्माण करू शकतो ?'


या प्रश्नामुळे एक फायदा होईल.कोणत्याही परिस्थितीत एकदम उडी मारण्यापासून आणि आपल्या इच्छेला अवास्तव महत्त्व देण्यापासून आपला बचाव आपण करू शकू.खूप आधी मी न्यू यॉर्कमध्ये एका हॉटेलमध्ये बॉलरूम वीस रात्रींकरिता भाड्याने घेत होतो. जेणेकरून मी माझी व्याख्यानमाला तिथे आयोजित करू शकेन.एकदा असं झालं,की एका सीझनची सुरुवात व्हायच्या आधीच मला तीन पट जास्त भाडं द्यावं लागेल अशी सूचना मिळाली.ही बातमी माझ्यापर्यंत पोहचायच्या अगोदरच तिकीटं छापून ती वितरीतही केली होती.व्याख्यानमालेचा प्रचारही झाला होता.सरळच होतं,की मला नक्कीच भाडेवाढ नको होती.पण हॉटेलवाल्यांशी याबाबतीत बोलून काय फायदा? माझ्या हिशोबाने वा इच्छेने तो हॉटेलमालक काम करत नव्हता,तो त्याच्या मर्जीप्रमाणे काम करत होता.दोन दिवसांनंतर मी हॉटेलच्या मॅनेजरला भेटायला गेलो.मी मॅनेजरला म्हणालो,"

तुमचे असे पत्र वाचून मला धक्काच बसला,पण त्याबद्दल मी तुम्हाला दोष देणार नाही.तुमच्या जागी असतो,तर मीसुद्धा कदाचित असाच वागलो असतो,हॉटेलचा अधिकाधिक फायदा कसा होईल हे पाहणे तुमचे मॅनेजर या नात्याने कर्तव्यच आहे. तुम्ही असे केले नाही,तर तुमचे वरिष्ठ तुम्हाला रागावतील आणि त्यांनी रागवलेच पाहिजे;पण तरीही मला असे वाटतेय की,कागद-पेन्सिल घेऊन भाडेवाढ केल्यामुळे होणारे फायदे व तोटे आपण लिहून काढू या."


मी लेटरहेड घेतले.बरोबर मधे एक उभी रेष काढली आणि दोन कॉलम्स करून फायदे व तोटे अशी शीर्षकं लिहिली.


फायदे या शीर्षकाखाली मी लिहिले'बॉलरूम फुकट!' "बॉलरूम तुम्ही डान्ससाठी केव्हाही भाड्याने देऊ शकता.व्याख्यानांसाठी हॉलमुळे जेवढे पैसे कमवू त्यापेक्षा अधिक पैसे हॉल डान्ससाठी भाड्याने दिला,तर मिळतील ! जर मी बॉलरुमबाबत वीस रात्रींसाठी टायअप कले,तर मात्र तुम्ही तोट्यात जाल." - अपुर्ण