* विजय गायकवाड | Vijay Gaikawad

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

३/६/२३

स्त्रीला तिच्या स्वतःच्या आयुष्याचे निर्णय घेण्याचा अधिकार हवा असतो.

किंग आर्थर नावाचा एक राजा होता.एका बेसावध क्षणी त्याच्या शेजारच्या राज्यातील राजाने त्याच्यावर हल्ला केला व त्यास कैद करून तुरुंगात बंदिस्त केले.पण तरुण आर्थरच्या विचारांनी त्याचे मतपरिवर्तन झाले आणि त्याने आर्थरला जीवदान द्यायचे ठरवले.


पण त्यासाठी त्याने आर्थर समोर एक आव्हानात्मक अट ठेवली की तो आर्थरला एक प्रश्न विचारेल आणि त्याचे उत्तर देण्यासाठी वर्षभरासाठी मुक्त करेल.त्या वर्षभरात आर्थर त्याचे उत्तर देऊ शकला तर आर्थरला कायमचे अभय नाही तर मृत्युदंड.


तर तो प्रश्न होता की,

" स्त्रियांना नेमके काय पाहिजे ? "

या प्रश्नाचे उत्तर शोधता शोधता भल्या भल्यांनी हात टेकले होते,तर तरुण आर्थरकडून हे उत्तर शोधले जाणे म्हणजे चमत्कारच ठरला असता.पण जीव वाचवायचा असेल तर उत्तर शोधलंच पाहिजे म्हणून तो स्वतःच्या राज्यात परतला.


तिथे त्याने अनेकांकडे विचारणा केली.त्यात त्याची राणी,नावाजलेले विद्वान,दरबारातले गणमान्य व्यक्ती एवढेच काय तर राजविदुषकाचे ही मत घेतले.पण कुणीही या प्रश्नावर समाधानकारक उत्तर देऊ शकले नाही.


मग काही जणांनी सुचवले की राज्याच्या बाहेरच्या जंगलात जी म्हातारी चेटकीण राहते तिला जाऊन भेट,

तिच्याशी सल्लामसलत कर.ती नक्कीच समर्पक उत्तर देऊ शकेल.पण तिचा सल्ला घेणे तुला चांगलेच महागात पडू शकते.कारण ती चेटकीण केलेल्या उपकारांची अवाजवी किंमत वसूल करण्यासाठी कुप्रसिद्ध होती.

हाताशी असलेला वेळ वेगाने संपत होता म्हणून अखेर आर्थरने तिच्याकडे जायचे ठरवले.


चेटकिणीने आर्थरचा प्रश्न नीट ऐकून घेतला व धूर्तपणे उत्तरली,"मी या प्रश्नाचे उत्तर अवश्य देईन पण त्याबदल्यात तुला माझी एक इच्छा पूर्ण करावी लागेल;तुझा मित्र लॅन्सलॉटला माझ्याबरोबर लग्न करावे लागेल."


सर लॅनस्लॉट आर्थरचा जवळचा मित्र होता व त्याची ओळख एक कुलीन व्यक्तिमत्त्व व शूर योद्धा अशी होती.


तिची हि मागणी ऐकून आर्थर सर्वार्थाने हादरला.ती चेटकीण जख्खड म्हातारी व दिसायला अत्यंत कुरूप होती.तिच्या मुखात केवळ एकच सुळा होता.तिच्या कंठातून चित्रविचित्र आवाज येत राहायचे व ती जिथे जाईल तिथे दुर्गंध पसरायचा.


आर्थरने तिची मागणी धुडकावून लावली. स्वतःचा जीव वाचवण्यासाठी स्वतःच्या मित्राला जिवंतपणी नरकयातना भोगायला लावायचे पाप त्याला माथी घ्यायचे नव्हते.


पण लॅन्सलॉटला जेव्हा हे कळले त्याने तडक चेटकिणीची मागणी पूर्ण करण्याचा हट्ट आर्थरकडे धरला.तो म्हणाला माझ्या मित्राच्या प्राणांपुढे हा त्याग काहीच नाही.

नाईलाजाने का होईना आर्थरने लॅन्सलॉटचे म्हणणे मान्य केले.लॅनस्लॉट व चेटकीण यांच्या विवाहाची घोषणा झाली.


तेव्हा चेटकिणीने आर्थरचा जीव वाचवणारे उत्तर दिले की.


" स्त्रीला तिच्या स्वतःच्या आयुष्याचे निर्णय घेण्याचा अधिकार हवा असतो. "


हे उत्तर ऐकून सर्वांना जाणीव झाली की चेटकिणीने एक महान सत्य उघड केले आहे.


शेजारच्या राज्याच्या राजालाही हे उत्तर पटले व त्याने आर्थरला सर्व बंधनांतून मुक्त केले.या घटनेच्या आनंदोत्सवाबरोबरच चेटकीण व लॅन्सलॉट यांचा विवाह धूमधडाक्याने पार पडला.


विवाहाच्या पहिल्या रात्री जड पावलांनी घाबरत घाबरतच लॅन्सलॉटने शयनकक्षात प्रवेश केला. पण समोरचे दृश्य बघून त्याला आश्चर्याचा सुखद धक्का बसला.मंचकावर चेटकिणीऐवजी एक अतिसुंदर रूपगर्विता तरुणी बसली होती.


धक्क्यातून सावरल्यावर त्याने त्या तरुणीला विचारले की हा बदल कसा काय झाला ?


त्यावर ती म्हणाली की, मी चेटकीण असतानाही तू माझ्याशी एवढा प्रेमाने वागलास म्हणून मी ठरविले आहे की दिवसातला अर्धाच काळ मी चेटकीणीच्या रूपात राहीन आणि उरलेला अर्धा काळ या सुंदर व तरुण रूपात.


आता मी कोणत्या वेळी चेटकिणीच्या रूपात राहायचे अन कोणत्या वेळी या रूपात राहायचे हे तुला ठरवायचे आहे.


यावर लॅनस्लॉटच्या मनात दोन विरुद्ध पर्यायांमुळे विचारांचे द्वंद्व सुरू झाले.दिवसा तरुणी होऊ दिले तर सर्वांसमोर रुपवान पत्नी म्हणून मिरवता येईल.पण एकांतात काय?


अन् त्याउलट पर्याय निवडला तर कसे होईल ?


आता कल्पना करा की लॅन्सलॉटच्या जागी तुम्ही आहात अन एका पर्यायाची निवड करायची आहे तर अशा वेळी तुम्ही कोणता पर्याय निवडला असता ?


तुमचा पर्याय ठरला असेल तर खाली लॅन्सलॉटचे उत्तर वाचा.


कुलीन लॅन्सलॉट चेटकिणीला म्हणाला की, आजपासून जरी तू माझी पत्नी असलीस तरी केव्हा कसे राहायचे हे ठरविण्याचा हक्क पूर्णपणे तुझाच आहे.तुला जेव्हा जसे आवडेल तेव्हा तू तशी राहा.

माझी कसलीही हरकत राहणार नाही.


हे ऐकून चेटकीण लॅन्सलॉटवर प्रचंड खूष झाली व तिने त्याला वचन दिले की ती चेटकिणीच्या रूपाचा कायमचा त्याग करेन.कारण लॅनस्लॉटने तिला आदराने वागवले व तिच्या आयुष्याचे निर्णय घ्यायचा पूर्ण हक्क तिला दिला.


अनामिक..

२/६/२३

विचार करायला लावणारी माणुसकी..!

घड्याळात रात्रीच्या नऊचे टण ठण टण टण टोल पडले तसे तशी माझी चिंता अधिकच वाढली.माझेसमोर बाबांचं कलेवर सकाळी बारा वाजेपासून पडलेलं,त्यांचा अंत्यविधी करायचा होता.पंधरा मजली या इमारतीत हजारों कुटुंबे होती,पण कोणाचाच कोणाशी संपर्क नाही.

शेजारच्या फ्लॅटमध्ये काय घडतंय हे ही कोणाला माहित नसायचं.जो तो आपापल्या कोषात मग्न,दरवाजे बंद करून तीन चार रूमच्या त्या सदनिकांमध्ये प्रत्येक जण मोबाईल,संगणक,whats app,face book,twitter, instagram च्या आभासी जगात व्यस्त.


सकाळीच मी आमच्या अपार्टमेंटच्या समूहावर बाबांच्या निधनाची पोस्ट टाकलेली.प्रत्येकाचे RIP,भावपूर्ण श्रध्दांजली,ईश्वर मृत्म्यास शांती देवो,तुम्हांस दुःख सहन करण्याची शक्ती,ओम शांती सारख्या मेसेजेसनी whats app फुल झालं.vertually सगळं झालं म्हणजे जणू संपलं,केलंय आपण सांत्वन हीच धारणा सगळ्यांची.पण कोणी प्रत्यक्ष येऊन मला भेटले नाही,मदत करणे तर दूरच.


बरे माझे नातेवाईकही भरपूर,सांगायला खंडीभर आणि कामाला नाही कणभर अशा वृत्तीचे.बाबा आजारी असल्याचं मी सगळ्यांना कळविलेलं.


"चांगल्या डाॅक्टरला दाखवा,ट्रिटमेंट करा,काळजी करु नका,होतील बाबा बरे,अशा संदेशांनी,होय संदेशचं आभासी जग.कोणी video call वरही बोलले,पण प्रत्यक्ष भेटीचा प्रत्यय त्यात कसा येणार.


प्रत्येकाची कारणे वेगवेगळी होती नाही येण्याची,कोणाच्या घराचं बांधकाम,मुलांच्या परीक्षा,नोकरीतून रजा न मिळणं,कोणाचा भराला आलेला शेती हंगाम,अर्थात कोणी येणार नव्हतंच.


"अहो,काहीतरी करा ना.रात्र वाढतेय,पिंटू ही पेंगुळलाय,पण झोपत नाही आहे.आजोबांना सारखं उठवायला सांगतोय,कसं समजावू त्याला."


" होय ग..मी प्रयत्न करतोय, कोणाला तरी बोलावतो मदतीला "


साडेनऊचा टोल घड्याळाने दिला.हे घड्याळही बाबांच्याच पसंतीचं,जुन्या काळातलं,टण टण टोल देणारं,माझ्या आधुनिक फ्लॅटमध्ये विराजमान झालेलं,

अनेकवेळा दुरूस्त करून कार्यरत ठेवलेलं.


दुपारपासून मी मदतीसाठी उंबरठे झिजविले.

जोशींकडे गेलो तर दरवाजा उघडून तेच बाहेर आले,"नाही जमणार हो मला यायला,माझ्या मुलाची दहावीची परीक्षा चालू आहे,त्याला आणायला जायचंय"


चौथ्या माळ्यावरील गुप्तांकडे गेलो...अरे भाईसाब मेरा छोटा भाई आ रहा है विदेशसे,उसे लेनेके लिए एअरपोर्ट जाना है मुझे...


तेराव्या माळ्यावरील मायकल फर्नांडीस म्हणाला,"आलो असतो रे,पण आज आमची अल्कोहोल अँनानिमसची मिटींग असते दर रविवारी,प्रबोधनात्मक भाषण तर असतेच,पण मला रूग्णांचे समुपदेशनही करावे लागते. घाबरु नकोस.धीर धर,स्वतःला सांभाळ."


सी विंगमधील पराडकरांकडे गेलो तर,अरे आज आमचं दासबोधाचं निरूपण असतं अशा (मौतीत जाणं,सुतकीय कार्य ) प्रसंगी आज नाही येता येणार मला.


शेजारचा"स्वामीनाथन" नात्यातील लग्नासाठी जाणार होता तर दहाव्या माळ्यावरील "सुत्रावे" विक एंडला गेलेला.


दुसर्‍या माळ्यावरील "कोटनाके" कवी संमेलनासाठी जाणार होते.प्रत्येकाची काही ना काही कामे घाबरू नको,

येईल कोणी मदतीला ही कोरडी सांत्वनपर वाक्ये.


काय करू..?आज पावसानेही हैराण केलेलं.दिवसभरात पावसाची रिप रिप चालू होती,आता त्याचाही जोर वाढला होता,मला तर भडभडून आलं.


मुंबईच्या उपनगरातचं माझ्या पत्नीची बहीण राहात होती,पण तिलाही नववा महिना असल्याने माझा साडूही येऊ शकत नव्हता. 


शेवटी मनाचा निग्रह करून उठलो,माझ्या इमारतीच्या समोरच भाजी विकणारा संतोष राहात होता.

हातगाडीवरचं त्याचा भाजीचा ठेला होता.


"संतोष"माझा काहिसा कापरा,आर्त,दाटलेला,अवरूध्द

स्वर ऐकून तो म्हणाला,"काय झालं साहेब,,,काही अडचण आहे काय ? रडताय कशापायी"


अरे दुपारी बाबा वारले,आता दहा वाजत आलेत,अजूनही मी त्यांची अंतेष्टी करु शकलो नाही.मदतच नाही मिळाली रे मला कोठे."


"ओह...बाबा गेलेत.आपण करू बाबांची अंतेष्टी.काळजी करू नका.माझे चार दोस्त आताच बोलावतो.करू आपण सगळं व्यवस्थित"त्याने फटाफट मोबाईलवरुन आपल्या मित्रमंडळींशी संपर्क साधला.


ये महेश,येतांना अंतेष्टीचं सगळं सामान घेऊन येशील,?होय आपल्या बाबासारखेच आहेत ते,या कार्याला आपला हातभार लागलाच पाहिजे.दिनेश,शिवा,आणि मधुकरलाही सांगशील.सगळं कसं फटाफट झालं पाहिजे,रात्र वाढतेय,पाऊसही हैराण करतोय.


संतोष व त्याच्या मित्रांनी बाबांची आंघोळ घालण्यापासुन तर तिरडी बांधण्यापर्यंतची सगळी कामे अर्ध्या तासात उरकली.


"मी वैकुंठरथाची व्यवस्था करतो." "अहो निलेश दादा कशाला वैकुंठ रथ हवा,माझा भाजीचा ठेला आहेच की आणि मोठी छत्रीही,बाबांना अजिबात ओलं होऊ देणार नाही."


चितेची लाकडेही संतोष व त्याच्या मित्रांनी फटाफट रचली.बाबांना सरणावर ठेवलं आणि माझ्या संयमाचा बांधच फुटला,संतोषनं मला सावरलं,माझ्या खांद्यावर हात ठेवून मला सहारा देत,मला मुखाग्नी द्यायला लावला.

पाणी पाजण्यासाठी माझ्यासोबत तोही चितेभोवती फिरला.बराच वेळ माझ्या खांद्यावर थोपटत राहिला.

चितेच्या ज्वाळा कमी झाल्या तशी संतोष म्हणाला," चला दादानु,घरी चला...वहिनी वाट बघत्याल" संतोषनं मला घरी सोडलं. 


"येतो दादा"...

"थांब संतोष" मी खिशात हात घालून दोन दोन हजाराच्या तीन नोटा काढल्या," घे संतोष"..हे काय दादानु,पैसे नकोत मला." 


"अरे तुम्ही खर्च केलात,वेळेवर धावून आलात,ही माझ्यासाठी फार मोठी मदत होती,याचं मूल्य पैशात होण्यासारखं नाहीच आहे,पण शेवटी हा व्यवहार आहे,घ्या हे पैसे" दादानु.."तुमचे बाबा आमचे बी बाबाचं की.नको मला पैसे.


शेवटी काय असतं दादानु,'माणूस मरतो हो,माणुसकी नाही.इथे व्यवहार गौण ठरतो दादा,येतो मी…


वहिनीस्नी सांभाळा,पिंटूच्या आणि तुमच्या खाण्यासाठी काही घेऊन येतो.


बाहेर पाऊसही आता मंदावला होता.बाबांना निरोप देण्यासाठीच जणू त्यानेही हजेरी लावली होती.


या आभासी जगातही कोठेतरी माणुसकी अजूनही शिल्लक होती.


नरदेह दुर्लभ या जगी

नराचा नारायण व्हावा

माणूस बनून माणुसकी जपण्याचा

अट्टाहास मनी बाळगावा.


डाॅ.शैलजा करोडे

नेरूळ नवी मुंबई

१/६/२३

आपणच वाट आणि आपणच वाटसरू अशी माणसाची अवस्था होती.

आयुर्वेद..


५,००० वर्षांपूर्वी भारतात आयुर्वेदाचा जन्म झाला असं मानलं जातं.आयुर्वेदाची सुरुवात कशी झाली त्याबद्दल अनेक कथा सांगितल्या जातात.त्यातली एक कथा अशी,

की पुराणात भगवान विष्णूचा अवतार मानला जाणारे धन्वंतरी मुनी हे देवांचे वैद्य होते,तर सुश्रुत मुनी हे जेव्हा देव आणि दानव समुद्रमंथन करत होते, तेव्हा हातात अमृताचा कलश घेऊन धन्वंतरी पृथ्वीतलावर अवतरले अशी कथा आहे.धन्वंतरी मुनींनी आपलं वैद्यकशास्त्राचं ज्ञान सुश्रुत या त्यांच्या शिष्याला दिलं.या दोघांनी मिळून शल्यक्रियेविषयी एक पुस्तक लिहिलं.ते पुस्तक नागार्जुन नावाच्या औषधशास्त्राशी संबंधित माणसाच्या हाती लागलं.त्यानं ते नीट जतन केलं आणि पुढे नेलं.ते जगातल्या पहिल्या काही शल्यविशारदांपैकी एक असले पाहिजेत.आयुर्वेदाची पाळंमुळं रुजवण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता.हळदीची रोगप्रतिबंधकशक्ती,रोगांचा अटकाव करणारे मिठाचे गुणधर्म या सगळ्या गोष्टींबरोबर एकूणच औषधी वनस्पती वापरून बहुतेक सारे आजार बरे करण्याची कल्पना प्रथम त्यांनीच मांडली.किंबहुना आज सर्रास वापरली जाणारी प्लास्टिक सर्जरी ते त्या काळातच करायचे! फक्त त्यांची पद्धत कालानुरूप अतिशय ओबडधोबड असे,इतकाच काय तो फरक.त्यांच्या सगळ्या शस्त्रक्रिया भुलेविनाच होत असल्या तरी त्या बहुतेक वेळा यशस्वी व्हायच्या हे विशेष! त्यांच्या कौशल्यामुळे विक्रमादित्याच्या दरबारातल्या नवरत्नांमध्ये नंतर त्यांचा समावेश झाला.


आयुर्वेदाबद्दल आणखी एक कथा प्रचलित आहे. ख्रिस्तपूर्व १३०० च्या सुमाराला भारतात रोगाच्या एका भयानक साथीनं थैमान घातलं होतं! त्यात लाखो माणसं दगावली. पुराणकथांमध्ये चरक मुनींनी लिहून ठेवलंय,की 'या भयानक संकटातून काय मार्ग काढायचा यावर विचार करण्यासाठी अनेक ऋषिमुनी हिमालय पर्वताच्या पायथ्याशी जमले.त्यांनी भारद्वाज मुनींना स्वर्गात देवांचा राजा असलेल्या इंद्राकडे पाठवून वैद्यकीय उपचारां -

विषयीचं ज्ञान पृथ्वीवर आणायला सांगितलं.भारद्वाज मुनींनी त्यानुसार दीर्घायुष्यासाठी काय करायला हवं याविषयी इंद्राशी चर्चा करून मिळवलेली माहिती घेतली आणि पृथ्वीवर परत येऊन आत्रेय मुनींना दिली.त्यातून आत्रेय मुनींनी तक्षशिला प्रांतामध्ये आयुर्वेदाविषयीचं गुरुकुल सुरू केलं.त्यामुळेच आत्रेय मुनींना भारतीय वैद्यकशास्त्राचा जनक मानलं जातं.त्यांच्या अग्निवेश,

भेल,जतुकर्ण,पराशर,हरित आणि क्षरपाणी या सहा शिष्यांनी वैद्यकीय विषयांवर अनेक प्रबंध लिहिले.

संस्कृतमधल्या आयुर्वेद या शब्दाचा सोपा अर्थ निरोगी दीर्घायुष्याचं ज्ञान असा लावता येईल.आयु म्हणजे आयुष्य आणि वेद म्हणजे ज्ञान.आयुर्वेदामध्ये माणसाचं आचरण आणि त्याचा आहार,स्वच्छता,व्यायाम आणि दिनक्रम यांच्याविषयी महत्त्वाचे सल्ले दिलेले आहेत.

सुरुवातीचं आयुर्वेदाचं ज्ञान चरक आणि सुश्रुत या दोघांनीच मिळून बनलेलं होतं. पण नंतर वाग्भटांनी लिहिलेला 'अष्टांग हृदय' नावाचा तिसरा प्रकारही आला.त्यात चरक आणि सुश्रुत यांच्या पद्धतींचा अर्क एकत्र करून थोडक्यात मांडलेला आहे.


सुश्रुतसंहितेमध्ये कुष्ठरोगाविषयी लिहिलेलं आढळतं.यात माणसाच्या संवेदना बोथट होतात, हातापायांची बोटं झडतात,शरीराचा आकार बेढब होतो,हातापायांवर व्रण उमटतात आणि नाक झडून चपटं होत जातं या सगळ्या लक्षणांची वर्णनं आहेत.ग्रीकांनी हा रोग भारतातून आपल्याकडे नेला आणि रोमनांनी मग तो इजिप्तमधून युरोपात पसरवला असं मानलं जातं.तसंच १८१७ साली पार्किन्सननं वर्णन केलेल्या पार्किन्सन्स डिसीज या रोगाशी अतिशय मिळतीजुळती वर्णनं कंपवात या नावानं सुश्रुतसंहितेमध्ये वाचायला मिळतात! सुश्रुतसंहितेमध्ये अनेक प्रकारच्या शल्यक्रियांविषयीही कमालीच्या अचूकतेनं लिहिलेलं आहे.उदाहरणार्थ,मोतीबिंदूवरच्या जवळपास आजच्या युगातल्या शस्त्रक्रियेचं वर्णन सुश्रुतांनी लिहिलेलं होतं.!


सगळ्या रोगांची मुळं वात,पित्त आणि कफ अशा तीन प्रकारच्या प्रकृतींच्या असंतुलनामध्ये असतात असं म्हटलं आहे.तसंच माणसाच्या शरीरात रस,रक्त,मांस (स्नायू), मेद (चरबी), अस्थी (हाड),मज्जा (हाडाच्या आतला चरबीसारखा मऊ पदार्थ),आणि शुक्र (वीर्य) असे सात महत्त्वाचे धातू असतात असं आयुर्वेद मानतं.आयुर्वेदाच्या उपचारपद्धतींमध्ये प्रामुख्यानं रुग्णाला विविध प्रकारची तेलं चोळणं,काढे आणि औषधं देणं,एनिमा देणं,त्याचं शरीरमर्दन करणं आणि शल्यक्रिया करणं यांचा समावेश होतो. पंचकर्मही आयुर्वेदात करतात. त्यात वमन,

विरेचन,नस्य,बस्ती,रक्तमोक्षण अशा पाच प्रकारे औषधोपचार केला जातो.तसंच गोमूत्र आणि गाईचं शेण या गोष्टींमध्ये जंतुनाशक तत्त्वं भरपूर प्रमाणात असल्यानं त्यांचा औषधांमध्ये वापर करावा असं आयुर्वेद मानतं.


इतर गोष्टींबरोबरच आयुर्वेदाचंही वर्णन भगवान विष्णूंचा अवतार असलेल्या व्यास ऋषींनी आपल्या 'वेद' या नावानं ओळखल्या गेलेल्या ग्रंथांमध्ये लिहून ठेवलं होतं. त्याचे चार मुख्य भाग मानले जातात.ते म्हणजे ऋग्वेद,सामवेद, यजुर्वेद आणि अथर्ववेद ऋग्वेदामध्ये सगळ्यांच्या अस्तित्वाविषयी लिहिलेलं आहे.तसंच विविध रोग आणि त्यांच्यावरच्या उपचारपद्धती यांचंही वर्णन त्यात आहे.


विश्वाची निर्मिती झाली तेव्हा त्यात पृथ्वी, जल,

अग्नी,वायू आणि आकाश या पंचमहाभूतं म्हणून ओळखल्या जाणाऱ्या घटकांचा समावेश होता असं मानलं जातं. माणूस हा विश्वामधलाच एक भाग असल्यामुळे त्याच्याही शरीरात हे पाच घटक असतातच,असं आयुर्वेद मानतं.


मग या घटकांचं माणसाच्या शरीरात असणारं प्रमाण किती असतं यावरून त्याची प्रकृती ठरते.यातूनच आयुर्वेदात वात,पित्त आणि कफ या दोषांविषयीची चर्चाही आढळते.


साहजिकच माणसाच्या शरीरात जेव्हा पंचमहाभूतांचं प्रमाण बिघडतं तेव्हा या तीन गोष्टींचं प्रमाण आणि संतुलनही बिघडतं असा त्यामागचा सिद्धान्त आहे.

उदाहरणार्थ,जेव्हा माणसाच्या शरीरात उष्णता वाढते तेव्हा पित्तदोष वाढतो,कोरडेपणा वाढला की वातदोष वाढतो आणि ओलेपणा वाढला की कफदोष वाढतो.असं काही झालं की माणूस आजारी पडतो,असं आयुर्वेद मानतं.हे सगळं होण्याचं कारण म्हणजे माणसाच्या सवयी,मन किंवा आजूबाजूचा परिसर यामध्ये बदल होतो.

मन आणि शरीर यांना जडणारे विकार आणि त्यांच्यावर आवश्यक असणारे उपचार यांचंही वर्णन त्यात केलेलं आहे.उदाहरणार्थ,वात प्रकृतीच्या लोकांना मलावरोध,

सांधेदुखी, अस्वस्थपणा हे आजार जडण्याची शक्यता जास्त असते.पित्त प्रकृतीच्या लोकांना जळजळ, रोगसंसर्ग,शरीराच्या आत व्रण पडणं हे विकार जडण्याचं प्रमाण जास्त असतं.कफ प्रवृत्तीच्या लोकांमध्ये वजन जास्त असणं,त्यांना मधुमेह होणं आणि हृदयाचे आजार होणं या गोष्टी आढळतात.


दोषांबरोबरच आयुर्वेद माणसाच्या शरीरातल्या धातू आणि मल या आणखी दोन गोष्टींना महत्त्वाचं मानतं.धातू हे माणसाच्या शरीराच्या रचनेशी संबंधित असतात.असे एकूण ७ धातू आणि मल म्हणजे शरीरातल्या अनावश्यक गोष्टी बाहेर टाकून देण्याचं काम करणाऱ्या गोष्टी.असे ३ प्रकारचे मल म्हणजे स्वेद (घाम), पुरिष (विष्ठा),आणि मूत्र (लघवी) असतात.


अथर्ववेदामध्ये अनेक आजारांचं आणि उपचारांचं वर्णन केलेलं आहे.त्यात मुख्यत्वे संधिवात,अपस्मार,कावीळ,

हत्तीरोग आणि हृदयविकार यांच्याविषयी लिहिलेलं आढळतं.सुरुवातीच्या उपचारपद्धती जादू किंवा धार्मिक बाबींवर आधारित असायच्या.यासंबंधी दोन पुस्तकांमध्ये लिहून ठेवलेलं आढळतं.एक म्हणजे चरक मुनींचं रोग आणि त्यांच्यावरचे उपचार यांचं वर्णन असणारं चरकसंहिता आणि दुसरं म्हणजे शस्त्रक्रियांविषयीचं धन्वंतरी मुनींच्या बनारसमध्ये राहणाऱ्या सुश्रुत या शिष्याचं सुश्रुतसंहिता.चरकसंहिता हा एक भन्नाटच प्रकार आहे.अतिशय विस्तारानं सगळ्या आजारांचं आणि त्यावरच्या उपचारांचं वर्णन असलेल्या या ग्रंथात तब्बल १२० प्रकरणं आहेत! त्यांचे सूत्र,निदान,शरीर,इंद्रिय, चिकित्सा,कल्प आणि सिद्धी असे ८ विभाग पाडलेले आहेत.सुश्रुतसंहितेतल्या शल्यक्रियेविषयीची माहिती

देखील ८ विभागांमध्येच लिहिलेली आहे. हे ८ विभाग म्हणजे आयुर्वेदाची खासियत,काया चिकित्सा, बाल चिकित्सा,ग्रह चिकित्सा,शल्य चिकित्सा, शल्यक तंत्र,

अदाग तंत्र,रसायन तंत्र आणि वजीकरण तंत्र ही ती ८ तंत्र आहेत.!


प्रसूतीच्या वेळी काही अडचण आली तर शस्त्रक्रिया (सिझेरियन) करून मुलाला आईच्या पोटातून सुखरूप बाहेर काढलं जावं अशी कल्पना काही काळानं आली.

हिंदू धर्म सुरुवातीपासूनच सोशिकपणा आणि कर्म करत राहणं या गोष्टींवर भर देत आला असताना भारतातून वैद्यकीय क्षेत्रात इतकं योगदान कसं मिळालं असेल असा प्रश्न अनेकांना पडतो.याचं उत्तर क्लिष्ट असलं तरी योगाभ्यास हा त्याचा एक मोठा पैलू मानला पाहिजे.मोहेंजोदडोमध्येसुद्धा योगमुद्रा कोरलेल्या आढळल्या.तसंच बुद्ध धर्मातले मुनी आणि जोगिणी रोग्यांवर उपचार करण्यासाठी इस्पितळ बनवत होते. याचाही इतिहासात उल्लेख आढळतो.दक्षिण भारत आणि सिलोन (आता श्रीलंका) इथंही स्थानिक प्रथांनुसार वैद्यकीय उपचारांमध्ये सतत प्रगती होत गेली.तमिळ लोकांच्या उपचारपद्धती अथर्ववेदापेक्षा वेगळ्या होत्या.

'सिद्ध' नावाच्या प्रसिद्ध तमिळ उपचारपद्धतीची सुरुवात बोगर आणि रामदेवर नावाच्या दोघांनी केली असं मानलं जातं.बोगर चीनमध्ये जाऊन आला होता तर रामदेवनं मक्केला जाऊन अरबांना अल्केमीचं तंत्र शिकवलं होतं.

गौतम बुद्धांच्या असंख्य शिष्यांपैकी कश्यप यांनी लहान मुलांच्या आजारांवर अनेक उपाय सुचवले.त्यांचा भर लसणाच्या औषधी गुणधर्मांचा जास्तीतजास्त प्रमाणात वापर करण्यावर असे.हिप्पोक्रॅट्सच्या शपथेतल्यासारखेच नियम भारतीय डॉक्टर्स पाळायचे.


त्यात भर म्हणजे कुठल्याही विवाहित स्त्रीवर तिचा नवरा हजर असल्याशिवाय उपचार केले जाऊ नयेत असाही एक संकेत होता!


आयुर्वेदात माणूस आजारी पडण्याच्या सहा पातळ्यांचं वर्णन केलं आहे.पहिल्या पायरीत माणसाच्या शरीरात एक किंवा अनेक दोषांची प्रमाणाबाहेर वाढ होते.दुसऱ्या पायरीत हे दोष इतके वाढतात,की त्यांचे दुष्परिणाम जाणवायला लागतात.तिसऱ्या पायरीत हे दोष हाताबाहेर जातात,आणि आता ते दृश्य स्वरूपात माणसाच्या शरीरावर दिसायला लागतात.चौथ्या पायरीत हे दोष माणसाच्या शरीराची दुर्बल किंवा आधी व्याधिग्रस्त झालेली जागा हुडकून ती आपणच बळकावून टाकतात.पाचव्या पायरीत माणूस पूर्णपणे रोगी किंवा आजारी झालेला असतो.सहाव्या आणि शेवटच्या पायरीत माणसाला दोषांवर आधारित ठरावीक प्रकारच्या व्याधी होतात.त्यामुळे आयुर्वेदिक पद्धतींचा अवलंब करणारे डॉक्टर्सही त्यांच्या उपचारपद्धतींमध्ये रुग्णाच्या तब्येतीचा इतिहास,त्याच्या सवयी,राहणीमान आणि त्याला कोणते दोष प्रमाणाबाहेर सतावतात हे बघूनच उपचार करतात.

बरेचदा या उपचारांची सुरुवात त्याच्या शरीराच्या शुद्धीकरणानं होते.कारण रोग्याच्या शरीरात साठलेल्या विषारी प्रवृत्तींना (किंवा दोषांना) बाहेर काढलं नाही तर त्या शरीरात आणखी पसरतात,असं आयुर्वेद मानतं. तसंच या प्रवृत्ती शारीरिकच नव्हे तर मानसिकही असू शकतात.उदाहरणार्थ,कधीकधी नैराश्याचे झटके येणं हा एक प्रकारचा रोगच माणसाला भेडसावत असू शकतो.

अशा वेळी त्या माणसाला राग का येतो याकडे बारीक लक्ष ठेवून तो बाहेर पडू देणं आणि तो परत येऊ नये. यासाठी हळूहळू उपाय योजणं ही मात्रा असू शकते.राग येताना आपल्याला काय वाटतं याकडे रुग्णानं लक्ष देणं आणि तसं परत होऊ नये यासाठी विचार करणं अशी ही उपचारपद्धती बरेचदा अतिशय यशस्वी ठरते!छातीत साठून राहिलेला कफ किंवा पोटात सतत अपचन होऊन येणारे गॅसेस अशा शारीरिक दोषांना बाहेर काढण्यासाठी आयुर्वेदामध्ये अनेकदा पंचकर्म केलं जातं.पंचकर्म म्हणजे ओकाऱ्या काढणं,रेचकाचं सेवन करणं,एनिमा घेऊन मलाद्वारे दोष बाहेर टाकणं,नस्यक्रिया करून नाकातून दोष बाहेर टाकणं आणि दूषित रक्ताला वाहू देणं या पाच क्रिया.यामुळे अनेकांना त्यांच्या त्रासातून मुक्तता मिळते अशी आयुर्वेदाची तत्त्वं आहेत.


नंतरच्या काळात मुस्लिमांच्या आक्रमणानं अरबी औषधपद्धतींची भारताला ओळख करून दिली. मग त्यात ग्रीक वैद्यकांची आणि गेलनच्या शोधांची भर पडणार होती.अकराव्या शतकात तुर्कस्तान आणि अफगाणिस्तान यांच्या भारतीय भूमीवरच्या आक्रमणाबरोबरच युनानी उपचार पद्धतीही भारत

भूमीवर आली.आजही ही उपचारपद्धती वापरणारे हकीम नावाचे वैद्य आहेतच !


११ जानेवारी २०२३ या लेखातील पुढील भाग

३०/५/२३

अँटहिलमधले मुंग्यांचे महासाम्राज्य

अँटहिलचा नायक रॅफला,तो अभ्यास करत असलेल्या मुंग्यांच्या जातीत आर्जेन्टीनी मुंग्यांत झाले तसेच एक जनुकीय परिवर्तन झाल्याचे आढळले.मग ह्यातून काय हाहाकार झाला त्याचे बारकाईने केलेले वर्णन हा त्याच्या संशोधन निबंधाचा महत्त्वाचा भाग बनतो.


ओढा-मुंग्या विजयाची फळं चाखत असतानाच फार पूर्वेला घुबड तलावाच्या कडेला एक मोठी पर्यावरणी घटना घडली.तलावाच्या किनाऱ्यावरचे पक्ष्यांचे,कीटकांचे आवाज बंद पडले.खारींची कचकच,उंदीर - चिचुंद्र्यांची चुकचुक,सारंच मंदावलं.वनस्पतींचं परागीकरण करणारी फुलपाखरं नष्टप्राय झाली.आणि कारण होतं,मुंग्यांच्या गणसंख्येतला स्फोट.हा बदल- मुंग्याही पायवाट - वारूळ,

ओढा वारूळ प्रजातीच्याच होत्या.नोकोबी परिसरात या प्रजातीची अनेक वारुळं होती.पण या मुंग्यांच्या जनुकांमध्ये काही कारणानं एक बारीकसा बदल झाला होता.त्यामुळे मुंग्यांची सामाजिक वागणूक पार बदलून गेली.बदल इतका मोठा होता,की जणू एक नवीन प्रजातीच घडली होती.पूर्वी एकेका वारुळात एक राणी-मुंगी आणि दहाएक हजार मुंग्या असायच्या.त्या प्रकारच्या वारुळाला आपण महाप्राणी म्हटलं होतं.आजही तसे महाप्राणी होते,पण सोबतच एक नवा महासमाज घडत होता.त्यात हज़ारो राणी- मुंग्या आणि कोट्यवधी इतर मुंग्या असायच्या.


प्रत्येक राणीचं वारूळ म्हटलं तर वेगळं असायचं,पण बदल- मुंग्यांची ही अनेक वारुळं जमिनीखालून भुयार-बोगद्यांनी जोडलेलीअसायची.या वारुळांमध्ये अन्नासाठी स्पर्धा नव्हती.त्यांच्यातल्या मुंग्या शक्तिप्रदर्शनाचे सामनेही भरवत नसत.फक्त एक महाप्रचंड, खादाड मुंग्यांचा तो समूह बनला होता. महासमाजाची क्षेत्रं वाढवायची पद्धत साध्या वारुळांच्या पद्धतीपेक्षा फार वेगळी होती.बदल- मुंग्या नवीन क्षेत्रांत बिळं खोदायच्या,आणि या नव्या ठाण्यांपासून गस्ती तुकड्या आणखीनच नव्या क्षेत्रात पाठवायच्या.या 


तुकड्या फार दूर जायच्या नाहीत,त्यामुळे शत्रू भेटलाच तर कुमक मागवणं सोपं जायचं.अन्न सापडलं,तर तेही लवकर घरी नेता यायचं.कोणी शत्रू भेटलाच,तर पुरेसं सैन्य जमा होईपर्यंत बदल-मुंग्या वाट पाहायच्या,आणि मग सामने शक्तिप्रदर्शन वगैरे न करता थेट हल्ला करायच्या.


ओढा-मुंग्यांना पूर्वेकडच्या सीमेवर पहिली गस्ती तुकडी भेटली,आणि लवकरच अनेक गस्ती दळं भेटू लागली.

ओढा - मुंग्यांनी एक सामना घेऊन शक्तिप्रदर्शन करायचं ठरवलं.त्यांच्या प्रजातीची ती पूर्वापार चालत आलेली पद्धत होती.तेव्हा महासमाजाचं गस्ती दळ भेटताच ओढा- मुंग्या पोट फुगवून,पाय ताठ करून त्यांना धमकावू लागल्या.


पण तसा कोणताच राजनैतिक व्यवहार न करता बदल- मुंग्यांची गस्ती दळं पळून गेली.ती गेली होती कुमक आणायला.कुमक येईपर्यंत जर ओढा-मुंग्यांचं शड्डू ठोकणं चालूच राहिलं,तर कुमक येताच धमकावणं,घाबरवणं,बोलाचाली, असं काहीही न होता बदल- मुंग्या पळायच्या तरी,नाही तर शर्थीचा हल्ला करायच्या.


होता होता आता या क्षेत्रात एकच शांत,स्थिर साम्राज्य होतं एकाच प्रजातीच्या मुंग्यांची वारुळं, त्यांचे सीमावाद,

त्यांची युद्धं,सगळं संपलं होतं. कोणी लढायचं,कोणी नवी वारुळं घडवायला राजकुमारी पैदा करायच्या,हे प्रश्न संपले.आता महासमाजाच्या अनेक राणुकल्या मोठ्या,

सुट्या राण्यांची जागा व्यापत होत्या.त्यांच्यापैकी दोनचार मेल्या,तरी महासमाजावर मोठा परिणाम होत नसे.क्षेत्रभर शांतता.सर्व मुंग्या समान,साम्राज्य अमर झालेलं.सगळे एका लहानशा जनुक स्थित्यंतराचे,त्यानं घडवलेल्या सामाजिक वागणुकीतल्या बदलाचे परिणाम.


समाजरचना बदलली.शासनपद्धती बदलली. प्रजेच्या जीवनाचा दर्जा बदलला.शांतता,समता,वाढ,सगळं असूनही महासमाज खऱ्या अर्थानं निरोगी नव्हता.तो आपल्या परिसरातल्या निसर्गाशी जुळून,संतुलित झालेला नव्हता. त्याची प्रचंड,घनदाट प्रजा परिसराला झेपत नव्हती.बदल- मुंग्यांच्या क्षेत्रातल्या काही वनस्पती,काही प्राणी कमी व्हायला लागले. काही तर नष्टच झाले.सर्वांत आधी संपल्या बदल-मुंग्यांसारख्या इतर मुंग्या;ओढा-वारूळ,पायवाट-वारूळ पद्धतीनं जगणाऱ्या.


जितकी एखादी जीवजात बदल- मुंग्यांना जवळची,

तितकी ती झपाट्यानं नष्ट झाली. बदल-मुंग्यांसारखंच अन्न खाणाऱ्या मुंग्यांची उपासमार व्हायला लागली.बदल- मुंग्यांच्या संख्येमुळे त्या अन्नावर आधी हात मारायच्या; आणि तसलंच अन्न खाणाऱ्यांना अन्न कमी मिळायचं.

त्यांच्या गस्ती मुंग्या,मावा किड्यांना दोहणाऱ्या मुंग्या यांची बदल-मुंग्यांशी भांडणं व्हायची.आणि संख्याबळामुळे नेहमी बदल- मुंग्याच जिंकायच्या.


नोकोबी परिसरातले मुंग्या खाणारे जीवही त्रासात होते.कोळी,बीटल भुंगे हे मुंग्या खाणारे जीव आता मुंग्यांच्या संख्येमुळे स्वतःच भक्ष्य व्हायला लागले. त्यांची संख्या घटल्यानं बदल- मुंग्यांची संख्या अधिकच वेगानं वाढू लागली.


महासमाजानं आपला परिसर कह्यात घेतला होता;शत्रू आणि स्पर्धकांवर मात केली होती; आपलं भौगोलिक क्षेत्र आणि अन्नक्षेत्र वाढवलं होतं;नवे ऊर्जास्रोत शोधले होते आणि या सगळ्यांचा परिणाम म्हणून मुंग्याची पैदास विक्रमी पातळीवर नेऊन ठेवली होती.पण घुबड तलावाच्या किनाऱ्यावरची महासमाजाची पकड टिकाऊ नव्हती.


परिसरशास्त्राच्या दीर्घ कालगणनेच्या मापांत महासमाज फारतर मूठभर वर्षे टिकणार होता.क्षेत्र वाढवतानाच त्याच्या बदल्यात महासमाजानं शाश्वतीचा बळी दिला होता.जे जनुक स्थित्यंतर यशाकडे नेणारे वाटले होते,ती खरं तर एक घोडचूक होती! परिसराचा ऱ्हास करणं ही महासाम्राज्याच्या स्थापने-साठी,वाढीसाठी दिलेली जबर किंमत होती.


असे आहे अँटहिल कादंबरीतले रूपक.मानवाने जनुकीय नाही,तर स्मरुकीय,निर्मुकीय बदलातून आपापसातले कलह कमी करून,आपली संख्या भरमसाट वाढवून जीवसृष्टीवर जबरदस्त आक्रमण केले आहे.हे परिवर्तन यशाकडे नेणारे भासत असले तरी ती खरं तर एक घोडचूक आहे.! परिसराचा ऱ्हास करणं,ही मानवी वर्चस्वाच्या स्थापनेसाठी दिलेली जबर किंमत आहे.


१८ मे २०२३ या लेखातील पुढील भाग..

२८/५/२३

द सेल्फिश जीन - रिचर्ड डॉकिन्स (१९७६)

'द सेल्फिश जीन' हे पुस्तक उत्क्रांतीचा जनुककेंद्रित प्रवास सांगणारं असून आज उत्क्रांतीच्या अभ्यासातला मैलाचा दगड समजलं जातं.या संपूर्ण प्रवासात सजीवांमधला जीन हा अत्यंत स्वार्थीपणे वागतो हे सूत्र मांडणारं 'द सेल्फिश जीन' हे पुस्तक वैज्ञानिकांसाठी बायबल आहे.अनेकांच्या आयुष्याचा कायापालट या पुस्तकाच्या वाचनानं झाला असल्याचं सांगितलं जातं.रिचर्ड डॉकिन्सच्या मते,"शुद्ध परहित जोपासणं,उत्तम संस्कृती,नव्या पिढीचं उत्तम पालनपोषण याची मनुष्य म्हणून आपण 'आता' चर्चा करू शकतो;परंतु जगाच्या संपूर्ण इतिहासात या सगळ्यांचं अस्तित्व पूर्वी अगदी प्राथमिक काळात कधीच नव्हतं.' "


१९७६ साली 'द सेल्फिश जीन' नावाचं एक देखणं,रंगीत मुखपृष्ठ असलेलं पुस्तक ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसनं प्रकाशित केलं.पुस्तकाचं शीर्षक ऐकून अनेकांच्या कपाळावर आठ्या जमा झाल्या;पण त्याच वेळी त्या पुस्तकावर असलेलं लेखकाचं नाव वाचून त्यांची त्या पुस्तकाविषयीची उत्सुकताही चाळवली गेली,कारण त्या लेखकाचं वैशिष्ट्यच असं होतं की,त्यानं हे पुस्तक लिहिलंय आणि या पुस्तकाचं शीर्षक 'द सेल्फिश जीन' आहे म्हणजे यामागे काही तरी कारण असणार,असा लोकांचा ठाम विश्वासही होता.शिवाय या पुस्तकाचं मुखपृष्ठ तयार केलं होतं,विख्यात प्राणिशास्त्रज्ञ डेस्मंड मॉरिस यानं विज्ञानविश्वातली उत्सुकता ताणणाऱ्या २२४ पानं असलेल्या या पुस्तकाच्या लेखकाचं नाव होत रिचर्ड डॉकिन्स ! चार्ल्स डार्विननंतर उत्क्रांतिवादी जीवनशास्त्रज्ञ म्हणून त्याचं नाव मानानं घेतलं जातं.


वर्षभरातच 'द सेल्फिश जीन' हे पुस्तक जगातल्या पहिल्या उत्कृष्ट १०० पुस्तकांच्या यादीत जाऊन बसल.जे पुस्तक जॉर्ज विल्यम्स यांनी १९६६ साली मांडलेल्या अनुकूलन आणि निसर्गनिवडीच्या सिद्धांतावर आधारित चर्चा करणारं होतं.पुस्तकाची सुरुवातच मुळी रिचर्ड डॉकिन्स यांनी जॉर्ज विल्यम्स यांच्या निसर्गनिवडीच्या सिद्धांतावर युक्तिवाद करत केली आहे.दुसऱ्याच्या कल्याणाचा विचार या गोष्टी कोणत्याही सजीवाच्या ग्रुप बेनेफिट म्हणजेच गटाच्या फायद्याचा परिणाम नसून एखाद्या दुर्मीळ परिस्थितीत जनुकानं केलेल्या निसर्गनिवडीवरच आधारित आहे.थोडक्यात काय तर कोणत्याही जनुकाच्या जेव्हा अनेक प्रती तयार होत असतात आणि नव्या प्रतीमध्ये बदल घडत असतात त्यालाच म्युटेशन असं म्हटलं जातं.म्हणजेच उत्परिवर्तन होत असतं त्या वेळी जी निसर्गनिवड जनुकाकडून केली जाते.ती खरं तर त्या सजीवाच्या संपूर्ण गटाच्या फायद्याथी आहे की नाही याचा विचार झालेला नसतो.जनुक त्या वेळी केवळ स्वकेंद्रित,स्वत: पुरताच विचार करून हे बदल घडवतं.म्हणजेच त्या क्षणी केवळ जनूकाच्या फायद्याचे निकष लावले जातात संपूर्ण सजीवाच्या जातीचा विचार केला जात नाही.थोडक्यात, या वेळी जनुक म्हणजेच जीन अत्यंत स्वार्थीपणे वागत असतं. कुठल्याही परिणामांचा विचार न करता उपलब्ध परिस्थितीत उपलब्ध असलेल्या रेणूंचा वापर स्वतःसाठी करणं इतकच काय ते त्या जीनला समजत असत.

त्यामुळेच या पुस्तकाचं शीर्षक समर्पक ठरले आहे.


अत्यंत टोकाच्या परिस्थितीतही हे जीन्स स्वतःच्या प्रती तयार करायला चुकत नाहीत.अत्यंत उच्च अशा पातळीवर उत्क्रांत होत राहाणं हे आणि इतकंच त्या जीन्सना समजतं.खरं तर विचार करणं या प्रक्रियेसाठी जीन्सना मेंदूसारखा अवयव नाही.नवी वंशावळ तयार करणं इतकंच ते जाणतात. 


रिचर्ड डॉकिन्स या लेखकानं आपल्या 'द सेल्फिश जीन' या पुस्तकात काही उदाहरणंदेखील दिली आहेत.हरणांच्या जातीत ते आपले चारही पाय हवेत फिरवून उंच उडी मारून ठरावीक आवाज काढून आपल्या जातिबांधवांना संकटाचा इशारा देतात,

जेणेकरून होणाऱ्या हल्ल्यापासून ते वाचू शकतील.दुसरे उदाहरण म्हणजे डॉल्फिन मासा जर जखमी झाला.तर इतर मासे त्याला समुद्राच्या किनारी येण्यासाठी मदत करतात.त्यामुळे त्याला ऑक्सिजनचा पुरवठा नीट होऊ शकतो याची जाणीव त्यांना असते.तिसरं उदाहरण म्हणजे वटवाघळ आपलं अन्न इतर अन्न न मिळालेल्या वटवाघळांबरोबर वाटून घेतात.तसंच मधमाश्यांमध्ये कामगार माश्या आपला स्वतःचा पुनरुत्पादनाचा हक्क सोडून राणीमाशीला सुरक्षा देणं,तिला अन्न पुरवणं आणि घर बांधणं अशी कामं करतात.


अशा प्रकारच्या उदाहरणावरून प्रत्येक सजीव जमात ही एकमेकाचे संरक्षण करण्याकरता एकमेकांना मदत करत असते.


असं करत असताना एकीकडे त्यांच्यामधली निःस्वार्थ वृत्ती आपल्या लक्षात येते,पण ही वृत्ती केवळ त्यांच्या जमातीपुरतीच मर्यादित असते.प्रसंगी स्वतःपुरता त्रास किंवा नुकसान सहन करूनही संबंधित जमात जगवली जाते.याचं एकमेव कारण म्हणजे वंश टिकवणं हेच असतं. म्हणजेच आपल्या जीन्सना पुढे ढकलणं.थोडक्यात,

जीन्सना स्वतः च्या अस्तित्वासाठी काही सजीवांचे बळी द्यावे लागले तरी चालतील,पण वंश टिकवला पाहिजे,ही भूमिका त्यामागे असते.जीन टिकवणं अत्यंत गरजेचं असतं. समजा,एका स्त्रीला तीन तरुण मुलं आहेत आणि त्या स्त्रीचं वय ६० वर्ष आहे.या चारपैकी एकाचा मृत्यू गृहीत धरायचा असल्यास तर त्यात पहिल्यांदा ही ६० वर्षांची स्त्री मृत्यूसाठी तयार होईल.या वेळी प्रेम वगैरे गोष्टी बाजूला ठेवून बघितलं तर जीवशास्त्रानुसार ती स्त्री आता पुनरुत्पादनासाठी योग्य नाही;पण त्याच वेळी तिची तिन्ही मुलं वंश टिकवण्याच्या दृष्टीनं सक्षम आहेत आणि या गोष्टीकरिता आपल्या मुलांना वाचवण्यासाठी ती स्त्री स्वत:चा मृत्यू ओढवून घेऊ शकते.यामध्ये समान सजीव जातींमध्ये परोपकार,निःस्वार्थीपणा दिसून येतो;पण जीन मात्र या ठिकाणी स्वार्थी ठरतं.अशा प्रकारचं सजीवांचं वागणं त्या त्या प्रजाती टिकवण्याकरिता आवश्यक असतं.समान प्रजातींमध्ये तसं न झाल्यास त्यांच्या त्यांच्यात भांडण होऊन ती ठरावीक प्रजाती नष्ट होण्याची शक्यता वाढते.


विज्ञान या विषयातलं असलं तरी 'द सेल्फिश जीन' हे पुस्तक आपल्याला अंगावर थरार उठतील अशा वाचनाचा अनुभव देतं.रिचर्ड डॉकिन्सनं या पुस्तकात अनेक उदाहरणं देत अनेक प्रकारची गुंतागुंत उलगडून दाखवली

आहे.उत्क्रांतीचा जनुककेंद्रित प्रवास सांगणार हे पुस्तक आजही उत्क्रांतीच्या अभ्यासातला मैलाचा दगड समजलं जातं.जीवसृष्टीच्या उत्पत्तीचं आणि विकासाचं गूढ उकलण्याचा प्रयत्न करणारी उत्क्रांतीची अभ्यासशाखा मानवाच्या जिव्हाळ्याचा आणि कुतूहलाचा विषय आहे.

या आदिम रहस्याच्या उकलीच्या प्रवासाची मुहूर्तमेढ खरं तर डार्विननं १८५९ सालीच रोवली.या प्रवासात उत्क्रांतीवर अभ्यास करणाऱ्या अनेक अभ्यासकांनी आपल्या ज्ञानानं, बुद्धीनं आपापलं ज्ञान जगासमोर मांडलं,पण या संपूर्ण प्रवासात सजीवांमधला जीन हा अत्यंत स्वार्थीपणे वागतो,हे सूत्र मांडणारं 'द सेल्फिश जीन' हे पुस्तक वैज्ञानिकांसाठी बायबल आहे.अनेकांच्या आयुष्याचा कायापालट या पुस्तकाच्या वाचनानं झाला असल्याच सांगितलं जातं.रिचर्ड डॉकिन्सच्या मते 'शुद्ध परहित जोपासणं,उत्तम संस्कृती,नव्या पिढीचं उत्तम पालनपोषण याची मनुष्य म्हणून आपण आता चर्चा करू शकतो,परंतु जगाच्या संपूर्ण इतिहासात या सगळ्यांचं अस्तित्व पूर्वी अगदी प्राथमिक काळात कधीच नव्हतं.' शिवाय या पुस्तकावर अभिप्राय म्हणून किंवा टीका म्हणून प्राइमॅटॉलॉजिस्ट फ्रान्स डी वॉल म्हणतात, 


'मानवाने बुद्धिमत्ता आणि मानवतेच्या आधारावर या स्वार्थी प्रतिकृतींवर विजय मिळवला आहे.' यावर रिचर्ड डॉकिन्स असं म्हणतो,की कुठल्याही नैतिकतेबद्दल या पुस्तकात चर्चा केलेली नाही, तर सजीवांच्या उत्क्रांतीविषयीच्या गुणधर्मांवर चर्चा केली आहे.


शिवाय या पुस्तकाच्या ३० व्या वर्धापनदिनी डॉकिन्सनं असंही म्हटलं की,या पुस्तकाचं नाव बदलण्याची संधी मिळाली तर याचं नाव मी इमॉर्टल जीन असं ठेवीन.

त्यामुळे कदाचित या नावामुळे वाचकांच्या मनात निर्माण झालेला गोंधळ टाळता येऊ शकेल.सगळ्यात महत्त्वाच म्हणजे (एमईएमई)


मेमे नावाचा शब्द डॉकिन्सन या पुस्तकात सर्वप्रथम वापरात आणला.


मीम ही एक कल्पना,ही एक शैली किंवा एक वर्तन आहे जे एखाद्या संस्कृतीतल्या व्यक्तीच्या अनुकरणातून पसरते आणि बरेचदा एखाद्या घटनेचं,संकल्पनेचं प्रतिनिधित्व करते.एखादी सांस्कृतिक कल्पना प्रतीक किंवा सराव यासाठी एक युनिट म्हणून वापरलं जाऊ शकतं.


'सेल्फिश जीन' हे जगप्रसिद्ध पुस्तक लिहिणाऱ्या रिचर्ड डॉकिन्स या लेखकाचा जन्म २६ मार्च १९४१ या दिवशी नैरोबी म्हणजे आताच्या ब्रिटिश केनिया इथे झाला.

त्याचे वडील क्लिंटन जॉन डॉकिन्स आणि आई जीनमेरी यांनी आपल्या या मुलाचं नाव क्लिंटन रिचर्ड असं ठेवलं होतं.पुढे क्लिंटन हे नाव कागदोपत्री बदलून रिचर्ड डॉकिन्स हेच नाव रूढ झालं. रिचर्ड डॉकिन्सला सारा नावाची एक लहान बहीणही होती.रिचर्ड डॉकिन्सच्या वडिलांची पूर्वापार वारसाहक्कानं मिळालेली खूपच मोठी शेतजमीन होती.ते एक व्यावसायिक शेतकरी होते.बालपणीच्या रिचर्डच्या आयुष्यात विशेष असं काही सांगण्यासारखं नाही.रिचर्डच्या आई- वडिलांना निसर्गविज्ञानात खूपच रस होता.रिचर्ड डॉकिन्सच्या विचारल्या जाणाऱ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देताना त्यांना आनंदच मिळत असे.घरात विज्ञानाला पोषक असं वातावरण असलं तरी ते सगळे नियमित चर्चेलादेखील जात असत.मात्र घरात विचार करण्याचं,चर्चा करण्याचं स्वातंत्र्य होतं.


खरं तर वयाच्या १३ व्या वर्षापर्यंत रिचर्ड डॉकिन्स चर्चमध्ये जाऊन प्रार्थना म्हणत असे आणि परमेश्वरावरही त्याचा नितांत विश्वास होता.वयाच्या १५ व्या वर्षी त्यानं डार्विनचं उत्क्रांतीवादावरचं लिखाण वाचलं आणि त्याचा प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून गेला.त्यानं चर्चमध्ये जाणं सोडलं, कारण त्याच्या मनाला अनेक प्रश्न पडायला लागले.ज्या लोकांचा 'परमेश्वर' या संकल्पनेवर विश्वास आहे ते लोक जीवशास्त्रातल्या गूढ़ रहस्याबद्दल इतके मागासलेले कसे काय असू शकतात?तसंच विज्ञानाचा अभ्यास करणाऱ्या लोकांचा परमेश्वर नावाच्या गोष्टीवर विश्वास कसा काय असू शकतो ? काही भौतिकशास्त्रज्ञ विश्वातल्या विस्मयकारक गोष्टींना 'परमेश्वर' असं संबोधन देतात;पण त्यामुळे लोकांमध्ये गोंधळ आणि गैरसमज निर्माण होऊ शकतो.


१९५४ ते १९५९ दरम्यान शालेय शिक्षण संपल्यानंतर रिचर्ड डॉकिन्स यानं ऑक्सफर्ड इथल्या बेलिऑल कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. या काळात त्यानं विख्यात साहित्यिक,गणितज्ञ आणि तत्त्वज्ञ सर बर्टांड रसेल याचं 'व्हाय आय अॅम नॉट अ ख्रिश्चियन' नावाचं पुस्तक वाचलं आणि तो पूर्णपणे नास्तिक बनला. १९६२ साली डॉकिन्सनं प्राणिशास्त्रातली पदवी मिळवली.शिकत असताना रिचर्ड डॉकिन्सला निकोलस टीनबेर्गन नावाचे नोबेल विजेते नीतिशास्त्रज्ञ शिकवत असत.पदवी मिळवल्यानंतर त्यांच्याच मार्गदर्शनाखाली रिचर्ड डॉकिन्सन एमए आणि त्यानंतर फिलॉसॉफीमध्ये डॉक्टरेटही मिळवली.१९६७ ते १९६९ या काळात रिचर्ड डॉकिन्सनं कॅलिफोर्निया विद्यापीठात प्रोफेसर म्हणूनही काम केलं.


उत्क्रांतीवादी जीवशास्त्रज्ञ आणि प्रोफेसर म्हणून काम करत असतानाच डॉकिन्सनं लिखाणही केलं.१९६७ साली 'सेल्फिश जीन' नंतर १९८२ साली 'द एक्स्टेंडेड फिनोटाइप',तर १९८६ साली 'द ब्लाइंड वॉचमेकर',२००६ साली 'गॉड डिल्यूजन',२०११ साली 'द मॅजिक ऑफ रिअॅलिटी' नावाची अत्यंत महत्त्वाच्या विषयांवरची पुस्तकं लिहिली.

त्याचं 'गॉड डिल्यूजन' म्हणजेच 'देवनामाचा भ्रम' हे पुस्तक आंतरराष्ट्रीय स्तरावर खूपच लोकप्रिय झालं. अल्पावधीत या पुस्तकाच्या ३० लाखांपेक्षाही जास्त प्रती विकल्या गेल्या.यात अनेक धार्मिक विश्वासांवर डॉकिन्सनं टीका केली आहे.त्याच्या मते या पद्धतीची विश्वासाची भावना तर्कहीन आहे.


उदाहरणार्थ,येशूने पाण्याची वाइन बनवली किंवा सूर्य कोरड्या पाण्यावर पडतो किंवा चंद्राची विभागणी केली वगैरे.या विश्वात कोणतीही अतींद्रिय शक्ती नाही.तसंच विश्वाची रचना केवळ मानवकेंद्रित असल्याचं मानणंदेखील बालिशपणाचं आहे,असं डॉकिन्सचं मत आहे


.ज्योतिषशास्त्र मानणं म्हणजे खगोलशास्त्राचा अपमान असल्याचं तो म्हणतो.


आस्तिक लोक परमेश्वर आहे,पण तो असल्याचं सिद्ध करता येत नाही,असं म्हणतात. परमेश्वर नाही ही गोष्ट तुम्ही सिद्ध करून दाखवा,असं त्यांचं म्हणणं असतं.यावर रिचर्ड डॉकिन्स अत्यंत रोचक पद्धतीनं उदाहरण देत म्हणतो,लहान असताना आपण सगळेच पऱ्यांच्या गोष्टी ऐकतो आणि वाचतो.त्या वेळी परी खरोखरच असते असंच आपल्याला वाटत असतं;पण पुढे जसजसे आपण मोठे होत जातो तसतशी ही परी अस्तित्वात नसते हे आपल्याला कळत.थोडक्यात,परी नाही हे सिद्ध होण्याची वाट बघायची की आपली सारासार बुद्धी वापरायची,असा प्रश्न तो वाचकांना करतो.


विज्ञानवादी असणारा रिचर्ड डॉकिन्स धर्म आणि धर्मग्रंथ यावरही परखडपणे आपली मत मांडतो.

धर्माची झापड लावणाऱ्यांना झापडबंद अनुयायीच हवे असतात.त्यांनी कशाचीही चिकित्सा न करता डोळे मिटून आपल्या धर्मग्रंथांवर विश्वास ठेवला पाहिजे.हेच त्यांना हवं असतं.रिचर्ड डॉकिन्सच्या मते अशा धर्माची आपल्याला काहीही आवश्यकता नसून आपल्याला प्रेम,शांतता,सदाचार ही मूल्य जागवणारं वातावरण हवं आहे.निवृत्तीची शिकवण देणारा धर्म आपल्या जीवित असण्याचा एक तऱ्हेनं अपमान आहे. 


'सत्य हे आपल्या सोयीचं नसतं.ते अनुकूल असू शकतं किंवा प्रतिकूल असू शकतं.ते जर सत्य म्हणून सिद्ध झालं तर स्वीकारलं पाहिजे.आजवरच्या धर्मग्रंथांनी केवळ पाप-पुण्याचा हिशोब केलाय,पण प्रत्यक्षात देवीसारख्या रोगांवर विज्ञानातल्या संशोधनामुळेच लस शोधता आली आहे,'असं ठणकावून रिचर्ड डॉकिन्स सांगतो.


त्यानंतर व्हिएटनाम युद्धाला विरोध म्हणून रिचर्ड डॉकिन्स यानं कॅलिफोर्निया सोडून ऑक्सफर्ड इथे शिकवायला सुरुवात केली.१९७० सालापासून ऑक्सफर्ड इथेच डॉकिन्स फेलो म्हणूनही रुजू झाला.अनेक महत्त्वाच्या विषयांवर त्यानं व्याख्यानं दिली.त्यातली डॉकिन्सची गाजलेली व्याख्यानं म्हणजे 


१९८९ मध्ये दिलेलं हेन्री सॅडविक मेमोरियल लेक्चर,१९९० मधलं एरॅसमस डार्विन मेमोरियल लेक्चर,१९९१ मधलं द मायकेल फॅरेडे लेक्चर,

डॉकिन्सन अनेक जर्नल्ससाठी संपादकाचंही काम बघितल.'एन्कार्टा सायक्लोपीडिया' आणि 'एनसायक्लोपीडिया ऑफ इव्हाल्यूशन' यासाठी सल्लागार संपादकाचं मोठं काम त्यानं केल


कौन्सिल फॉर ह्यूमॅनिझमसाठी सीनियर कॉलमिस्ट म्हणून त्याचं नेहमीच नाव घेतलं जात असे.फॅरेडे अॅवॉर्ड, ब्रिटिश अॅकॅडमी टेलिव्हिजन अँवार्ड यातल्या जज पॅनेलसाठीही परीक्षक म्हणून रिचर्ड डॉकिन्सनं काम बघितलं.


रिचर्ड डॉकिन्सच्या वैयक्तिक आयुष्यात त्यानं तीन वेळा लग्न केली.तिसरं लग्न त्यानं १९९२ साली कॅल्ला वार्ड या अभिनेत्रीशी केल.२०१६ साली त्यांचा घटस्फोट एकमेकांच्या संमतीनं आणि मैत्रिपूर्ण रीतीनं झाला.रिचर्ड डॉकिन्सला एक मुलगी आहे.


६ फेब्रुवारी २०१६ या दिवशी रिचर्ड डॉकिन्सला मेंदूमध्ये रक्तस्राव होऊन हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागलं,पण वर्षभरातच त्याची प्रकृती चांगली झाल्याचं सांगण्यात आलं.


स्वतःला नास्तिक म्हणवून घेणारा रिचर्ड डॉकिन्स हा नीतिशास्त्रज्ञ,प्राण्यांच्या वर्तनाचा अभ्यास करणारा अभ्यासक,उत्क्रांतीविषयी अभ्यास करणारा जीवशास्त्रज्ञ आजही मानवतावादी दृष्टिकोन ठेवून वयाच्या ८० व्या वर्षी एखाद्या तरुणाला लाजवेल अशा उत्साहानं काम करत असतो.अनेक पुस्तकं लिहिलेली असताना,कित्येक मानाचे पुरस्कार मिळालेले असताना,किंचितही गर्व किंवा अहंकार रिचर्ड डॉकिन्समध्ये नाही.त्याच्या 'सेल्फिश जीन' या पुस्तकानं 'द गार्डियन्स'च्या यादीत पहिल्या शंभरांत स्थान पटकावलं आहे.२०१७ साली 'द सेल्फिश जीन' हे सगळ्यात प्रभावी पुस्तक ठरलं.चार्ल्स डार्विनचं 'ओरिजिन ऑफ स्पीशीज आणि न्यूटनचं 'प्रिन्सिपिया मॅथेमॅटिका' या पुस्तकांपेक्षाही 'द सेल्फिश जीन'नं प्रचंड लोकप्रियता मिळवली.


२००८ सालच्या सप्टेंबर महिन्यात ऑक्सफर्ड विद्यापीठातून प्रोफेसर या पदावरून रिचर्ड डॉकिन्स निवृत्त झाला असून रिचर्ड डॉकिन्स फाऊंडेशन फॉर रिझन अँड सायन्स (RDERS) नावाची संस्था त्यानं स्थापन केली आहे.ही संस्था वैज्ञानिक दृष्टिकोनावर आधारित संशोधनासाठी पैसा पुरवण्याचं काम करते.

तसंच मानसशास्त्र, धर्म यावर आधारित संशोधनांनाही पाठबळ देते. दरवर्षी या संस्थेमार्फत 'नास्तिकता' या विषयावर काम करणाऱ्या व्यक्तीला हा पुरस्कार दिला जातो.२०२० साली हा पुरस्कार भारतातल्या जावेद अख्तर यांना देण्यात आला हे विशेष.डॉकिन्स हा पूर्णतः नास्तिक विचारांचा असून वेगवेगळ्या नास्तिक,

धर्मनिरपेक्ष आणि मानवतावादी संघटनांचा समर्थक आहे.आपल्या सडेतोड वागण्यामुळे रिचर्ड डॉकिन्स नेहमीच एका वलयात असतो.त्यानं आपले विचार पसरवण्यासाठी शेकडो व्हिडीओज् उपलब्ध केले आहेत.शिवाय उत्क्रांती आणि निरीश्वरवाद या विषयांवरची त्याची व्याख्यानं जगभर सुरू असतात.त्याचं हे अफाट काम बघून त्याचे टीकाकार त्याला मिलिटंट अथिस्ट म्हणतात.


द सेल्फिश जीन' या थरार निर्माण करणाऱ्या पुस्तकाचा शेवट रिचर्ड डॉकिन्सन खूप सुरेखरीत्या केला आहे. 


तो म्हणतो,'आम्ही जीन मशीन म्हणून तयार आहोत आणि मेम मशीन्स म्हणून सुसंस्कृत आहोत,पण आपल्या निर्मात्याविरुद्ध फिरण्याची शक्ती आपल्यात आहे.आम्ही एकटेच पृथ्वीवरच्या स्वार्थी प्रतिकृती आणणाऱ्यांच्या जुलमाविरोधात बंड करू शकतो.'


समजून न घेताच समाधानी राहा असं धर्म सांगतो,म्हणून मी धर्माच्या विरोधात आहे.


२६ मार्च २०२३ या लेखातील पुढील भाग