* विजय गायकवाड | Vijay Gaikawad: विचार करायला लावणारी माणुसकी..!

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

२/६/२३

विचार करायला लावणारी माणुसकी..!

घड्याळात रात्रीच्या नऊचे टण ठण टण टण टोल पडले तसे तशी माझी चिंता अधिकच वाढली.माझेसमोर बाबांचं कलेवर सकाळी बारा वाजेपासून पडलेलं,त्यांचा अंत्यविधी करायचा होता.पंधरा मजली या इमारतीत हजारों कुटुंबे होती,पण कोणाचाच कोणाशी संपर्क नाही.

शेजारच्या फ्लॅटमध्ये काय घडतंय हे ही कोणाला माहित नसायचं.जो तो आपापल्या कोषात मग्न,दरवाजे बंद करून तीन चार रूमच्या त्या सदनिकांमध्ये प्रत्येक जण मोबाईल,संगणक,whats app,face book,twitter, instagram च्या आभासी जगात व्यस्त.


सकाळीच मी आमच्या अपार्टमेंटच्या समूहावर बाबांच्या निधनाची पोस्ट टाकलेली.प्रत्येकाचे RIP,भावपूर्ण श्रध्दांजली,ईश्वर मृत्म्यास शांती देवो,तुम्हांस दुःख सहन करण्याची शक्ती,ओम शांती सारख्या मेसेजेसनी whats app फुल झालं.vertually सगळं झालं म्हणजे जणू संपलं,केलंय आपण सांत्वन हीच धारणा सगळ्यांची.पण कोणी प्रत्यक्ष येऊन मला भेटले नाही,मदत करणे तर दूरच.


बरे माझे नातेवाईकही भरपूर,सांगायला खंडीभर आणि कामाला नाही कणभर अशा वृत्तीचे.बाबा आजारी असल्याचं मी सगळ्यांना कळविलेलं.


"चांगल्या डाॅक्टरला दाखवा,ट्रिटमेंट करा,काळजी करु नका,होतील बाबा बरे,अशा संदेशांनी,होय संदेशचं आभासी जग.कोणी video call वरही बोलले,पण प्रत्यक्ष भेटीचा प्रत्यय त्यात कसा येणार.


प्रत्येकाची कारणे वेगवेगळी होती नाही येण्याची,कोणाच्या घराचं बांधकाम,मुलांच्या परीक्षा,नोकरीतून रजा न मिळणं,कोणाचा भराला आलेला शेती हंगाम,अर्थात कोणी येणार नव्हतंच.


"अहो,काहीतरी करा ना.रात्र वाढतेय,पिंटू ही पेंगुळलाय,पण झोपत नाही आहे.आजोबांना सारखं उठवायला सांगतोय,कसं समजावू त्याला."


" होय ग..मी प्रयत्न करतोय, कोणाला तरी बोलावतो मदतीला "


साडेनऊचा टोल घड्याळाने दिला.हे घड्याळही बाबांच्याच पसंतीचं,जुन्या काळातलं,टण टण टोल देणारं,माझ्या आधुनिक फ्लॅटमध्ये विराजमान झालेलं,

अनेकवेळा दुरूस्त करून कार्यरत ठेवलेलं.


दुपारपासून मी मदतीसाठी उंबरठे झिजविले.

जोशींकडे गेलो तर दरवाजा उघडून तेच बाहेर आले,"नाही जमणार हो मला यायला,माझ्या मुलाची दहावीची परीक्षा चालू आहे,त्याला आणायला जायचंय"


चौथ्या माळ्यावरील गुप्तांकडे गेलो...अरे भाईसाब मेरा छोटा भाई आ रहा है विदेशसे,उसे लेनेके लिए एअरपोर्ट जाना है मुझे...


तेराव्या माळ्यावरील मायकल फर्नांडीस म्हणाला,"आलो असतो रे,पण आज आमची अल्कोहोल अँनानिमसची मिटींग असते दर रविवारी,प्रबोधनात्मक भाषण तर असतेच,पण मला रूग्णांचे समुपदेशनही करावे लागते. घाबरु नकोस.धीर धर,स्वतःला सांभाळ."


सी विंगमधील पराडकरांकडे गेलो तर,अरे आज आमचं दासबोधाचं निरूपण असतं अशा (मौतीत जाणं,सुतकीय कार्य ) प्रसंगी आज नाही येता येणार मला.


शेजारचा"स्वामीनाथन" नात्यातील लग्नासाठी जाणार होता तर दहाव्या माळ्यावरील "सुत्रावे" विक एंडला गेलेला.


दुसर्‍या माळ्यावरील "कोटनाके" कवी संमेलनासाठी जाणार होते.प्रत्येकाची काही ना काही कामे घाबरू नको,

येईल कोणी मदतीला ही कोरडी सांत्वनपर वाक्ये.


काय करू..?आज पावसानेही हैराण केलेलं.दिवसभरात पावसाची रिप रिप चालू होती,आता त्याचाही जोर वाढला होता,मला तर भडभडून आलं.


मुंबईच्या उपनगरातचं माझ्या पत्नीची बहीण राहात होती,पण तिलाही नववा महिना असल्याने माझा साडूही येऊ शकत नव्हता. 


शेवटी मनाचा निग्रह करून उठलो,माझ्या इमारतीच्या समोरच भाजी विकणारा संतोष राहात होता.

हातगाडीवरचं त्याचा भाजीचा ठेला होता.


"संतोष"माझा काहिसा कापरा,आर्त,दाटलेला,अवरूध्द

स्वर ऐकून तो म्हणाला,"काय झालं साहेब,,,काही अडचण आहे काय ? रडताय कशापायी"


अरे दुपारी बाबा वारले,आता दहा वाजत आलेत,अजूनही मी त्यांची अंतेष्टी करु शकलो नाही.मदतच नाही मिळाली रे मला कोठे."


"ओह...बाबा गेलेत.आपण करू बाबांची अंतेष्टी.काळजी करू नका.माझे चार दोस्त आताच बोलावतो.करू आपण सगळं व्यवस्थित"त्याने फटाफट मोबाईलवरुन आपल्या मित्रमंडळींशी संपर्क साधला.


ये महेश,येतांना अंतेष्टीचं सगळं सामान घेऊन येशील,?होय आपल्या बाबासारखेच आहेत ते,या कार्याला आपला हातभार लागलाच पाहिजे.दिनेश,शिवा,आणि मधुकरलाही सांगशील.सगळं कसं फटाफट झालं पाहिजे,रात्र वाढतेय,पाऊसही हैराण करतोय.


संतोष व त्याच्या मित्रांनी बाबांची आंघोळ घालण्यापासुन तर तिरडी बांधण्यापर्यंतची सगळी कामे अर्ध्या तासात उरकली.


"मी वैकुंठरथाची व्यवस्था करतो." "अहो निलेश दादा कशाला वैकुंठ रथ हवा,माझा भाजीचा ठेला आहेच की आणि मोठी छत्रीही,बाबांना अजिबात ओलं होऊ देणार नाही."


चितेची लाकडेही संतोष व त्याच्या मित्रांनी फटाफट रचली.बाबांना सरणावर ठेवलं आणि माझ्या संयमाचा बांधच फुटला,संतोषनं मला सावरलं,माझ्या खांद्यावर हात ठेवून मला सहारा देत,मला मुखाग्नी द्यायला लावला.

पाणी पाजण्यासाठी माझ्यासोबत तोही चितेभोवती फिरला.बराच वेळ माझ्या खांद्यावर थोपटत राहिला.

चितेच्या ज्वाळा कमी झाल्या तशी संतोष म्हणाला," चला दादानु,घरी चला...वहिनी वाट बघत्याल" संतोषनं मला घरी सोडलं. 


"येतो दादा"...

"थांब संतोष" मी खिशात हात घालून दोन दोन हजाराच्या तीन नोटा काढल्या," घे संतोष"..हे काय दादानु,पैसे नकोत मला." 


"अरे तुम्ही खर्च केलात,वेळेवर धावून आलात,ही माझ्यासाठी फार मोठी मदत होती,याचं मूल्य पैशात होण्यासारखं नाहीच आहे,पण शेवटी हा व्यवहार आहे,घ्या हे पैसे" दादानु.."तुमचे बाबा आमचे बी बाबाचं की.नको मला पैसे.


शेवटी काय असतं दादानु,'माणूस मरतो हो,माणुसकी नाही.इथे व्यवहार गौण ठरतो दादा,येतो मी…


वहिनीस्नी सांभाळा,पिंटूच्या आणि तुमच्या खाण्यासाठी काही घेऊन येतो.


बाहेर पाऊसही आता मंदावला होता.बाबांना निरोप देण्यासाठीच जणू त्यानेही हजेरी लावली होती.


या आभासी जगातही कोठेतरी माणुसकी अजूनही शिल्लक होती.


नरदेह दुर्लभ या जगी

नराचा नारायण व्हावा

माणूस बनून माणुसकी जपण्याचा

अट्टाहास मनी बाळगावा.


डाॅ.शैलजा करोडे

नेरूळ नवी मुंबई