* विजय गायकवाड | Vijay Gaikawad

live

नमस्कार आपले स्वागत आहे. मी पुस्तके आणि मित्रांवर पैसे खर्च करतो,माझ्याकडे दगड आणि विटांवर खर्च करण्यासाठी पैसे नाहीत.- रस्किन बाँड.ही थोर माणसं व त्यांचे विचार मला पुस्तकात भेटलीत.ती भेटली आणि त्यांनी सांगितले कि, प्रत्येक दिवशी असं काही तरी करा की,ते तुम्हाला अधिक सुंदर उद्याच्या दिशेने खूप लांबवर घेऊन जाईल."- डोग फायरबाऊ.' सर्वियन कादंबरीकार मिलोराद पावीच यांचे एक वाक्य आहे ते म्हणतात - जोवर जगात पुस्तक वाचणाऱ्या वाचकांची संख्या बंदूकधारी सैनिका पेक्षा अधिक आहे तोवर काळजीच काहीच कारण नाही.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात.पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये.म्हणून अविरतपणे प्रयत्न करणारे मार्गदर्शक, मित्र धावून येतात.प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,डॉ.दीपक शेटे,आ.भरत बुटाले,प्रा.सर्जेराव राऊत,सुभाष ढगे,अनिल फारणे,डॉ.सुधीर सरवदे ,विश्वास खाडे, विनायक पाटील,संजय कुंभार,सतीश खाडे,मनोहर सुर्वे,गणेश खंदारे,तात्या गाडेकर, दादासाहेब गाडेकर, दादासाहेब ताजणे, पुस्तकातील घटना प्रसंग सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील यांनी केलेले आहे. मला लिहिण्याची प्रेरणा देणारी पुस्तके,लेखक,प्रकाशक,मित्र ही जगावेगळी माणसं माझ्या जीवनातील महत्वाचा टप्पा आहेत.... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ.मेघा गायकवाड, चिरंजीव मयान,माझ्या धावण्यातील गुरुवर्य नामदेव बरुरे,लुल्ला शेख मोठी ताई ,लहान ताई जयश्री शिंदे या सर्वांचेच मनापासून आभार व धन्यवाद मॅट्रिक फेल विजय गायकवाड

२४/८/२३

जग जिंकूनही निर्वासित अवस्थेत मरणारा नेपोलियन- Napoleon died in exile despite conquering the world..

अठरावे शतक हे बंडखोरीचे शतक होते.सर्वत्र राजांची फर्माने व धर्मोपदेशकांचे हट्ट यांविरुद्ध बंडे होत होती.

राजा व धर्म दोहोंच्याही कचाट्यातून जनता मुक्त होऊ पाहत होती.सर्व जगभर क्रांतिकारक विचारांचा विद्युतसंचार होत होता.व्हॉल्टेअर पॅरिसला शेवटची भेट द्यावयास आल्यावेळी तेथील विज्ञानमंदिरात बेंजामीन फ्रँकलीन त्याला भेटला होता.दोघा बंडखोरांनी परस्परांना मिठ्या मारून चुंबने घेतली. भोवतालचे लोक म्हणाले, "सोलोनसोफोक्लिस हेच जणू परस्परांना आलिंगन देत आहेत.किती सुंदर दृश्य हे !" ज्याने आकाश फाडून त्यातून विद्युत खाली आणली होती,ओढून घेणार होता,

असा तो अमेरिकन छापखानेवाला,विज्ञानवेत्ता व स्वतंत्र विचारवादी बेंजामीन या वेळी अमेरिकन क्रांतीला सोळाव्या लुईची सहानुभूती मिळवण्यासाठी आला होता.इंग्रजांच्या सत्तेवर आघात करण्यासाठी फ्रेंच राजा सदैव टपलेला असे.त्याने अमेरिकेशी करार केला.वस्तुतः त्याला त्या बंडखोरांना मदत देण्याची मनापासून इच्छा नव्हती.पण नाखुशीने का होईना,इंग्रजांची सत्ता नष्ट करण्यासाठी म्हणून त्याने मदत देण्याचे मान्य केले.

अमेरिकेतील विचार फ्रान्समध्येही येणार हे त्याला समजत नव्हते,असे नाही.पेन,जेफरसन,फ्रँकलीन,

वॉशिंग्टन वगैरे अमेरिकन क्रांतीचे पुढारी लुईच्या मते धोकेबाज होते.ते सारे बंडखोर होते,एवढेच नव्हे तर देववादी म्हणजे चर्च वगैरेंची जरूर न ठेवता देवाला मानणारे होते. 'चर्चची अडगळ कशाला?' असे ते म्हणत. नास्तिकतेकडे जाणाराच त्यांचाही रस्ता होता. व्हॉल्टेअरच्या मतांप्रमाणेच,या अमेरिकन क्रांतिकारकां -

चीही मते,राजांच्या दैवी हक्कांच्या तत्त्वावर उभारलेल्या सामाजिक रचनेचा पाया उखडून टाकू पाहणारी होती.

लुईने अमेरिकनांशी मैत्री जोडण्याचे कारण त्याचे अमेरिकनांवरील प्रेम नसून तो इंग्रजांचा द्वेष करीत असे,हे होते. त्याने अमेरिकनांना पैसे दिले,फौजा दिल्या.पण अमेरिकेतील क्रांतीची प्रगती मात्र तो सचिंत होऊन पाहत होता.लुईला वाटत असलेली भीती खरी ठरली.


१७८९ सालच्या वसंत ऋतूत,अमेरिकेत वॉशिंग्टनचे इनॉगरेशन होण्याच्या थोड्याच दिवस आधी लुईच्या स्वत: च्या देशात क्रांतीचा वणवा पेटला.फ्रेंच राज्यक्रांती बरीचशी रशियन राज्यक्रांतीसारखीच होती.प्रथम मिरोबाच्या नेतृत्वाखाली मध्यम वर्गाने राजाविरुद्ध बंड केले.रशियात केरेन्स्कीच्या पक्षाने झारविरुद्ध केलेल्या बंडासारखेच हे बंड होते.पण पुढे डान्टन, राब्सोरी,मरात वगैरे जहाल पुढारी लेनिन, ट्रॉट्स्की इत्यादी रशियन क्रांतिकारकांप्रमाणे अधीर झाले.त्यांना मवाळ पुढाऱ्यांचा मवाळपणा आवडेना,त्यांना दूर करून त्यांनी सत्ता स्वतःच्या हाती घेतली व राजाचा शिरच्छेद केला. 

सरदारांचे विशिष्ट हक्क त्यांनी नष्ट केले. त्यांच्या पदव्या रद्द केल्या व अमेरिकेच्या स्वातंत्र्याच्या जाहीरनाम्याप्रमाणे मानवी हक्कांचा जाहीरनामा काढला.त्यांनी चर्चची मालमत्ता जप्त केली व ती सरकारच्या हवाली केली.

ईश्वराच्या पूजेविरुद्ध एक फतवा काढून ईश्वराच्या पूजेऐवजी त्यांनी 'बुद्धीची दैवी पूजा' सुरू केली.त्यांनी बुद्धीला ईश्वराच्या सिंहासनावर बसवले.येथपर्यंत

क्रांती बरीचशी रक्तहीनच झाली.पण १७९१ साली प्रशियाचा राजा व ऑस्ट्रियाचा सम्राट पिल्लिट्झ येथे भेटले.फ्रेंच क्रांतीविरुद्ध प्रतिक्रांती सुरू करण्यासाठी ते जमले होते. हद्दपार केलेले फ्रेंच सरदार व इतर राजनिष्ठ लोक यांचे सैन्य त्यांनी गोळा केले व सर्व जगाच्या कल्याणासाठी पुन्हा राजेशाही सुरू झालीच पाहिजे असे जाहीर केले.या घोषणेमुळे फ्रेंच क्रांतिकारकांच्या भावना पेटून उठल्या.ते जणू चवताळले!घरच्या राजेशाहीची नावनिशाणी नष्ट करायची एवढेच नाही,तर सर्व युरोपमधील राजेशाही नष्ट करून साय युरोपचेच रिपब्लिक करायचे,असे त्यांनी ठरवले.त्यांनी तुरुंग फोडले व शेकडो कैद्यांना ठार केले.त्यांनी सर्व रेन ऑफ टेरर' सुरू केले. त्यांनी सुरू केलेला मरणमारणाचा कारभार अक्षम्य होता.युद्धाचा मार्ग आजपर्यंत कधीही प्रगतीचा ठरला नाही. खुनाखुनी करून मिळवलेला कोणताही विजय महत्त्वाचा नसतो.लाखोंच्या प्राणांचे मोल देण्याइतका मूल्यवान विजय कोणताच नसतो. फ्रेंच क्रांतिकारकांनी हिंसेचा अवलंब केला व शेवटी अपरिहार्य ते झालेच.जयाचे परिवर्तन पराजयात झाले. पण फ्रेंच राज्यक्रांतीतील या दुदैवी घटनेला उगीच नावे ठेवण्यात अर्थ नाही. ही भीषण राजवट सुरू करणारे घाबरून गेले होते.त्यांची डोकी ठिकाणावर नव्हती.त्यांनी हे सर्व आत्मरक्षणासाठी केले.नवीनच मिळालेल्या स्वातंत्र्यामुळे ते मस्त झाले होते.पण ते स्वातंत्र्य जाणार की काय,अशा भीतीने ते वेड्यासारखे झाले.आपण काय करीत आहोत,

हे त्यांना कळेना.एच. जी. वेल्स लिहितो की, 'राजाचा कैवार घेणाऱ्यांनी क्रांतिकारकांच्या अत्याचारांची अतिशयोक्तिपूर्ण वर्णने केली आहेत.त्याच्या मते आपण फ्रेंच क्रांतीत मारल्या गेलेल्यांची इतकी वर्णने ऐकतो याचे कारण ते जरा बड़े व प्रतिष्ठित लोक होते.जास्तीत जास्त चार हजार लोक मारले गेले असतील आणि त्यांपैकी बरेचसे क्रांतीच्या विरुद्ध होते.फ्रेंच रिपब्लिकविरुद्ध सुरू असलेल्या लढाईत ते खुशीने सामील झाल्यामुळे त्यांना लढाईची फळे भोगावी लागली.एच. जी. वेल्स म्हणतो," १९१६ मधील 

सोम आघाडीवरच्या लढाईच्या वेळी ब्रिटिश सेनापतींनी संबंध फ्रेंच राज्यक्रांतीच्या काळात जितके लोक मारले गेले होते,त्यापेक्षा अधिक एका दिवसात मारले!" इतिहासाच्या अंगणात गरिबांच्या विव्हळण्यापेक्षा श्रीमंतांच्या रडण्याचेच प्रतिध्वनी अधिक मोठे उमटत असतात.


पण एकाने अन्याय केला म्हणून काही दुसऱ्याने केलेला अन्याय क्षम्य ठरत नाही.फ्रेंच राज्यक्रांतीती 'रेन ऑफ टेरर' एकंदरीत लज्जास्पदच होते.एवढेच नव्हे;तर त्यासाठी किंमतही जबर द्यावी लागली.क्रांतिकारकांना स्वतःचे स्वातंत्र्य गमावून बसावे लागले.त्यांनी रिपब्लिकच्या रक्षणासाठी टाकलेल्या पावलांतून इतिहासातील एक अत्यंत चढाऊ युद्ध निर्माण झाले.

त्यातच फ्रेंच रिपब्लिक नष्ट होऊन त्यातून नेपोलियनच्या साम्राज्यशाही तृष्णा जन्माला आल्या.


नेपोलियनच्या लढायांचा आरंभ रिन ऑफ टेरर मधून झाला.नेपोलियन मूळचा इटलीमधला. १७६९ साली कॉर्सिका बेटावर त्याचा जन्म झाला.फ्रान्समधील लष्करी विद्यालयात त्याचे शिक्षण झाले.मुसोलिनीप्रमाणे,तोही आरंभी क्रांतिकारक व जहाल होता.तो गबाळ व केसाळ होता.त्याचे केस कधी नीट विंचरलेले नसत. पावडर वगैरे कुठलीतरी,कशीतरी फासलेली असायची.त्याला घरी नीट शिक्षण मिळाले नाही. तो पॅरिसच्या रस्त्यातून अहमन्यतेने भटकत फिरे.क्रांतीचे शत्रू नष्ट करून क्रांती वाचवण्याची जबाबदारी त्याने स्वतःच्या शिरावर घेतली. आपणच हे काम करू शकू असे तो म्हणे.त्यावेळी त्याचे वय फक्त सत्तावीस वर्षे होते. पण लढवय्या म्हणून त्याने आपली योग्यता आधीच दाखवली होती.ती म्हणजे १७९५ साली राजाची बाजू घेणाऱ्यांचे बंड मोडून त्याने रिपब्लिकविषयी आपली निष्ठा दाखवली होती. तेव्हा क्रांतीच्या नेत्यांनी नेपोलियनला सैन्य देऊन सांगितले, "ही सेना घे व साऱ्या जगाला जिंकून त्याची फ्रेंच रिपब्लिकच्या धर्तीवर पुनर्रचना कर." पण हातात शस्त्र घेणारे आजपर्यंत कधीच जगाचे उद्धारक ठरले नाहीत.जगाला वाचवू शकले नाहीत.नेपोलियन आणि त्याच्या फौजा यांनी जगाचा धुव्वा उडवला.आपले मनोरथ पूर्ण करून घेण्यासाठी नेपोलियनने क्रांतीचा साधन म्हणून उपयोग करून घेतला.त्याने पहिली स्वारी इटालियनांविरुद्ध केली.आपण त्यांची बंधने तोडण्यासाठी जात आहोत असे त्याने जाहीर केले.पण इटलीवर तुटून पडणाऱ्या आपल्या शिपायांना तो म्हणाला, "आपण या देशावर दोन कोटी फ्रैंक खंडणी लादू (म्हणजेच तितकी संपत्ती लुटून नेऊ).

जगातील अत्यंत समृद्ध मैदानात मी तुम्हाला नेत आहे.

तुम्हाला तिथे गेल्यावर यश,संपत्ती,मानसन्मान सारे काही मिळेल." त्यानुसार वरील सर्व मिळाले.पण त्याच्या शिपायांना मात्र मरणच लाभले.


इटलीतील विजयामुळे नेपोलियन फुगला.तो आपणास ज्युलियस सीझरच्या प्रमाणात पाहू लागला.पूर्वेकडील देशात आपणही आपले वैभव दाखवले पाहिजे.आपला दरारा तिकडील राष्ट्रांवरही बसवला पाहिजे असे त्याला वाटले. म्हणून त्याने इजिप्तमधील लोकांना आता मुक्त केले पाहिजे.हे आपल्या देशबांधवांना पटवून दिले व आपल्या आज्ञाधारक क्रांतिकारक कोकरांना इजिप्तमध्ये नेऊन त्यांना तेथील उंच पिरॅमिड्स दाखवले.त्यांच्या भावना पेटवल्या, त्यांनी मरावयास तयार व्हावे म्हणून तो म्हणाला, "तीस शतके त्या पिरॅमिड्सवरून तुमच्याकडे पाहत आहेत!" इतिहासातील अती प्रसिद्ध व अत्यंत मूर्खपणाचे हे वाक्य आहे.या वाक्यात लष्करशाहीचे स्वरूप प्रतीत होत आहे. लष्करशाही जिवंत व प्रगतीपर वर्तमानकाळाला भूतकाळाशी जखडून टाकून प्रगती होऊच देत नाही.लष्करशाही आम्हाला आपले जीवनाचे नाटक जणू भुतासमोर करावयास लावते.चार हजार वर्षे- मृतांची चार हजार वर्षे - तुमच्याकडे पाहत आहेत,म्हणून मारा व मरा असे ही सांगत असते.एका वेडपटाचा मूर्खाच्या पिढीला हा उपदेश आहे.तो मूर्खानी ऐकला मानला व ते मेले.त्या वेडपटाचे वैभव व त्याची कीर्ती वाढवण्यासाठी ते मूर्ख मातीत पडले.


नेपोलियन फक्त स्वतःची पूजा करी व बाकी साऱ्या दुनियेला तुच्छ मानी,कृतज्ञतेशी त्याचा परिचय नव्हता.

मानवी दुःखाविषयी त्याला सहानुभूती नसे.इजिप्तमधील जखमी शिपायांना परत स्वदेशी आणणे हे फार त्रासाचे होते.म्हणून त्यांना क्लोरोफॉर्म देऊन त्याने ठार मारले. नेपोलियन वंचक व असत्यवादी होता.त्याला सत्य ठाऊक नव्हते.तो दंभाचा पुतळा होता. फसवणूक करणे हा तर त्याचा धर्म होता.ज्या ध्येयांवर त्याची श्रद्धा नव्हती तीही आपली आहेत,असे तो खुशाल सांगे.पाळावयाची नसलेली वचनेही तो खुशाल देई.चढाऊ वीराचा तो आदर्श नमुना होता.जगावर सत्ता गाजवू पाहणारे तलवारबहाद्दर असेच असतात.मानवी प्राणी म्हणजे मातीची डिखळे,असे तो मानी व तो आपली लहर तृप्त करण्यासाठी या मातीला मन मानेल तसा आकार देई वा फोडून टाकी.

आपल्या कारकिर्दीच्या आरंभी त्याने 'आपण मानवजातीचे मित्र आहोत' असे ढोंग केले. युरोपभर अनेक रिपब्लिके स्थापून त्याने ती स्वतःच लुटली.

क्रांतीच्या नावाने लढत असता तो स्वतःचेच घोडे कसे पुढे दामटता येईल,हेच खरोखरी पाहत असे.सैन्यावर आपला पूर्ण ताबा बसला आहे असे दिसल्यावर त्याने १८०४ साली पोपला बोलावून आणून त्याच्याकडून 'फ्रान्सचा ईश्वरनियोजित सम्राट' असा अभिषेक आपणास करून घेतला. कार्लाईल म्हणतो, "त्या राज्याभिषेकात कशाचीही वाण नव्हती. पाच लाख लोक त्यासाठी मेले नव्हते का? मग आणखी कोणते भाग्य हवे?" आतापर्यंत तो 'पददलितांचा कैवारी' म्हणून मिरवला. पण आता तो अत्यंत रानटी व जुलमी हडेलहप्पी बनला.युरोपातील साऱ्या रिपब्लिकांच्या पुन्हा राजेशाह्या करून स्वतःच्या भावात व आप्तेष्टांत त्याने सारे युरोप जणू वाटून टाकले.

पण हे भावांवर व आप्तेष्टांवर त्याचे प्रेम होते म्हणून नव्हे,तर राजे बनवणे व नष्ट करणे हा आपला खेळ आहे.

आपल्या तळहाताचा मळ आहे असे त्यांना दाखवून दिपवून टाकण्यासाठी,आपण 'कर्तुमकर्तुमन्यथाकर्तुम' असे सत्ताधारी आहोत हे तो दाखवू इच्छित होता.एखाद्या उकिरड्यावर ऐटीने बसणाऱ्या कोंबड्याप्रमाणे उद्ध्वस्त जगाच्या विनाश राशीवर तो बसला होता.आपणास अद्यापीही या कोंबड्याचे कुकूऽ कू सर्व राष्ट्रांतील मुलांच्या वर्गातून शिकवण्यात येत असते व या नवयुवकांतून पुढच्या चढाईचे शिपाई तयार करण्यात येत असतात.

जीवनाच्या सुरुवातीला नेपोलियन नास्तिकवादाकडे झुकत होता.पण आता तो धार्मिक झाला."धर्माशिवाय दुसऱ्या कोणत्या युक्तिवादाने 'आपल्या दारिद्र्यातच समाधान माना' हे गरिबांना पटवून देता येईल बरे?" असे तो म्हणे. एक अपचनाने आजारी आहे,तर एक भुकेने मरत आहे हा जगातील भेद,ही जगात दिसणारी विषमता मनुष्याने सहन करावयास पाहिजे असेल तर, कोणीतरी असे सांगणारा हवाच की, 'ईश्वराचीच तशी इच्छा आहे. जगात गरीब व श्रीमंत हे भेद असावे असा ईश्वरी संकेतच आहे!' असे सांगितले तरच लोक गप्प बसतील.नेपोलियन ईश्वराचा भूतलावरील अधिकृत प्रतिनिधी बनला. 'दरिद्री व पददलित असूनही प्रजेने शांत राहावे, समाधान मानावे.' यासाठी जणू नेपोलियनचा अवतार होता.इतर सर्व गोष्टींप्रमाणे त्याने धर्माचेही प्रबळ लष्करी शास्त्र बनवले व परकीयांवर हेरगिरी करण्यासाठी परदेशात मिशनरी पाठवले.तो म्हणे, "आशिया,आफ्रिका, अमेरिका इत्यादी ठिकाणी या मिशनऱ्यांचा मला खूप उपयोग होईल.त्या त्या देशांची हकिकत मला या मिशनऱ्यांतर्फे मिळेल.त्या पाद्र्यांचा धार्मिक पोशाख त्यांचे रक्षण करील व त्यायोगे त्यांचे व्यापारी व राजकीय हेतू कोणास कळणार नाहीत.

"त्याला आता एकाच ध्येयाचा स्वतःच्या सत्तेचा ध्यास लागला होता. सत्ता कोणत्या मार्गांनी मिळवायची याचा विधिनिषेध त्याला नसे.मार्ग कोणताही असो,सत्ता हाती राहिली म्हणजे झाले,असे तो म्हणे.जुन्या क्रांतिकारक सहकाऱ्यांचा 'कल्पनावादी' अशी टिंगल करून ते स्वातंत्र्य व सुधारणा या ध्येयांचा पुरस्कार करीत.म्हणून त्याने त्यांना दूर केले.स्वातंत्र्याचा हट्टच धरून बसणाऱ्यांना तो तुरुंगात टाकी. त्याला टीकेची भीती वाटे म्हणून तो टीकाकारांना दया दाखवीत नसे.'साऱ्या जगाला थक्क करणे, दिपवून टाकणे' हे त्याचे त्याचे ध्येय असल्यामुळे त्याने प्रत्येक विरोधी आवाज दडपून टाकण्याचे ठरवले.

आपण वर्तमानपत्रांना स्वातंत्र्य दिल्यास आपली सत्ता तीन दिवसही टिकणार नाही,असे त्याला वाटे.


नेपोलियन एक क्षुद्र वृत्तीचा जाहिरातबाज होता. त्याने केलेल्या युद्धांचा हेतू जगाला गुलाम करणे एवढाच नसून जगाला दिपवणे,थक्क करणे हाही होता.जय कोणी का मिळवीना,टाळ्या व श्रेय मात्र नेहमी तोच घेई.तो स्वत:ची स्तुती स्वतः करणारा होता.त्याला मोठा आवाज करणे आवडे.तो म्हणतो,कीर्ती व प्रसिद्धी म्हणजे काय? जो जास्त आवाज करतो,तोच प्रसिद्ध होतो.जितका अधिक मोठा आवाज केला जाईल,तितका अधिक दूर तो ऐकू जातो.कायदे, संस्था,स्मारके,राष्ट्रे सर्व नष्ट होतात.पण आवाज मात्र टिकतो पुढच्या काळात,पुढच्या युगातही टिकतो.आणि म्हणून नेपोलियन जगासमोर मोराप्रमाणे नाचत होता.तो दरोडे घालीत,निंदा करीत,फसवीत,खून करीत,वल्गना करीत, पराक्रम दाखवत होता.स्वतःच्या मोठेपणाची स्तुतिस्तोत्रे तो स्वतःच गाई. व्हिक्टर ह्यूगो म्हणतो, "देवालाही जणू त्याचा कंटाळाच आला!" तो आणखी म्हणतो, "पुरे झाला नेपोलियन! फार झाली त्याची चव ! विटलो, विटलो आता! ( मानव जातीची कथा,हेन्री थॉमस,अनुवाद - साने गुरुजी,मधुश्री पब्लिकेशन)

आणि नंतर त्याचा अध:पात झाला.स्वतः च्या फाजील महत्त्वाकांक्षेमुळेच त्याचा नि:पात झाला.आपल्या साम्राज्यात रशिया व इंग्लंड यांचाही समावेश करायला तो उत्सुक होता. म्हणून सहा लाख सैन्य घेऊन तो मॉस्कोवर स्वारी करण्यास निघाला.पण पुढे कित्येक महिन्यानंतर काही हजार दरिद्री,भिकार, मरतुकड्या,निःसत्त्व व निरुत्साही शिपायांसह पराभूत होऊन परत आला.त्याला जय मिळत होते,तोपर्यंत त्याच्या यशोज्योतीभोवती पतंगाप्रमाणे मरण्यास ते तयार होते.पण मॉस्कोहून ही जी अनर्थकारक पिछेहाट झाली, तिने फ्रेंचांचे डोळे उघडले.

नेपोलियन हा जगाला दिपवू पाहणारा एक शुद्ध वेडपट आहे हे त्यांनी ओळखले.त्याच्या महत्त्वाकांक्षेच्या रोगाने लाखो तरुण शिपायांना नाहक मृत्यूमुखात लोटले होते. नेपोलियनने पुन्हा असला काही खोडसाळपणा करू नये.

म्हणून त्याचे देशबांधव व्यवस्था करू लागले.या मूर्खपणाला आळा बसला पाहिजे, असे त्यांना वाटू लागले.म्हणून त्यांनी त्याला एल्बा बेटावर हद्दपार केले.

पण तो अकरा महिन्यांनी तेथून निसटला व स्वत: च्या वेड्या व चढाऊ लष्करशाहीने पुन्हा एकदा जगात दरारा बसवण्याची खटपट करू लागला.तथापि सुदैवाने या वेळचे त्याचे हत्याकांड अल्पायुषी ठरले.ही खुनाखुनी,ही लूटमार फार दिवस चालली नाही.पळून आल्यापासून नव्वदच दिवसांनी वॉटर्लू येथे त्याचा पराभव झाला. त्याने गलबतातून अमेरिकेत जाण्याचा प्रयत्न केला.पण इंग्रजांनी त्याला पकडून सेंट हेलेना बेटाच्या निर्जन किनाऱ्यावर स्वतःच्या गुन्हेगार वृत्ती- भोगेच्छा व आकांक्षा

मनात खेळवीत बसायला पाठवून दिले.आयुष्याची शेवटची सात वर्षे त्याने येथे आपल्या आठवणी लिहिण्यात घालवली.या स्मृतीत त्याने स्वतःला जवळजवळ महादेव बनविले आहे. १८२१ साली तो कॅन्सरने मरण पावला व जगाला थोडासा विसावा मिळाला. फ्रेंच राज्यक्रांती करणाऱ्या पुढाऱ्यांनी एक फार मोठी चूक केली.त्यांनी तलवारीच्या जोरावर आपल्या कल्पनांचा प्रसार करण्याचा प्रयत्न केला.जगाला मुक्त करण्यासाठी त्यांनी सैन्य उभे केले.पण हेच साधन हाती घेऊन नेपोलियनने स्वतः च्याच देशाला गुलाम केले.

यशासाठी हिंसेवर विसंबून राहणाऱ्या फ्रेंच क्रांतीचा गळा शेवटी हिंसेनेच दाबला जाणे अपरिहार्य होते व ते नेपोलियनने केले.नेपोलियनने फ्रान्सची मर्यादा, तीच युरोपची मर्यादा करण्याची खटपट केली. कारण त्याला स्वत:च्या क्षुद्र दिमाखासाठी सारे युरोप रंगभूमी म्हणून हवे होते.पण सारे करून तो सेंट हेलेना बेटावर जाऊन बसला,

तेव्हा युरोपचे स्मशान झाले होते.फ्रान्स पूर्वीपेक्षा लहान झाला.नेपोलियनवर स्वतःच्या जीवन-नाटकातील शेवटचा प्रवेश उष्ण कटिबंधातील एका अज्ञात आणि निर्जन बेटावर करावा लागला.अनंत आकाश व अफाट सागर हेच तेवढे प्रेक्षक होते.


अलेक्झांडर खूप दारूची मेजवानी झोडून मेला. हॅनिबॉलने शत्रू सारखे पाठीस लागले म्हणून आत्महत्या केली.सीझरला सर्वांत मोठा विजय मिळवायचा होता.त्याच दिवशी तो मारला गेला आणि नेपोलियनला एखाद्या क्रूर,वन्य श्वापदाप्रमाणे कैद करून मरण्यासाठी दूर ठेवण्यात आले.इतिहासातील या सर्वांत मोठ्या चार सेनापतींपैकी एकाच्याही हातून जगाच्या सुखात किंवा संस्कृतीत तिळमात्रही भर पडली नाही व खुद्द त्यांनाही सुख लाभले नाही,अशा हडेलहप्पींशिवायच जगाचे नीट चालेल. 




२२/८/२३

शोध 'शून्या' च्या उगमाचा -The search for the origin of 'zero' - भाग - २

यावरून इसवी सनाच्या दहाव्या शतकात इथल्या गणितींची किती प्रगती झाली होती हे स्पष्ट होतं.ज्याअर्थी दहाव्या शतकात एवढी प्रगती होती त्याअर्थी त्या प्रगतीला त्याआधी काही शतकं तरी सुरुवात झालेली असावी असं यातून स्पष्ट होत होतं.खजुराहो इथे मिळालेले जादुई चौरस आणि वेगवेगळे आकडे म्हणजे भारतीय अंकांचे ठोस पुरावे आहेत.असेच आकडे भारतात इतरत्रही सापडतात.याबद्दल इतरांचं म्हणणं वाचून ॲक्झेल यांनी मांडलेलं मत प्रचलित विचारांशी मिळतंजुळतं आहे.

भारतात आकडे आणि एकंदरीतच गणिताचा उगम धार्मिक कृत्यांशी संबंधित आहे.वेदांमध्ये आणि वैदिक काळातील आख्यायिकांमध्ये यज्ञकुंडं,मंदिरं,यज्ञात बळी द्यायच्या पशूंची संख्या आदी गोष्टींकरता अंकांची आणि भूमितीची नक्कीच आवश्यकता होती. प्राचीन भारतीय संस्कृतीचा इतिहास अभ्यासून त्यावर संशोधन करणाऱ्या जॉन मॅक्लिश या तज्ज्ञाच्या मते- 'भारतातील आद्य संस्कृतींच्या रहिवाशांमध्येसुद्धा आकड्यांची जाण असल्याचं दिसून येतं.सुमारे पाच हजार वर्षांपूर्वी भारतीय उपखंडात भरभराटीस आलेल्या हडप्पाच्या संस्कृतीत

सुद्धा दशमान पद्धतीची प्राथमिक जाणीव होती.भारतीय लोक इजिप्त,बॅबिलॉन आणि मायसेनिया इथल्या लोकांपेक्षा गणनपद्धतीबाबत खूप पुढे होते.वैदिक संस्कृतीत यज्ञवेदी रचण्यासाठी जी काटेकोर अचूकता लागत होती ती आकडेमोडीची व भौमितिक प्रमेयांची माहिती असल्याशिवाय शक्यच नव्हती.' असं असलं तरी ॲक्झेल यांना लिखित पुरावा हवा होता.प्रत्यक्ष ते शून्य पाहिल्याशिवाय त्यांचं समाधान होणार नव्हतं. भारतातही ते वेगवेगळ्या राज्यांतील प्राचीन मंदिरांत आणि संग्रहालयांत फिरून आले.त्यांना सर्वांत जुनं लिखित शून्य ग्वाल्हेर इथल्या एका विष्णू मंदिरात सापडलं.हे मंदिर इ. स. ८७६ मध्ये बांधण्यात आलं होतं.पण इ. स. ८७६ मध्ये अरब व्यापारी त्या वेळच्या ज्ञात जगात सर्वत्र फिरत होते.शून्याचा शोध पूर्वेत कुठे तरी लागला आणि अरब व्यापाऱ्यांनी ते पश्चिमेकडं आणलं, तसंच ते सागरामार्गे भारतात नेलं ही शक्यता नाकारता येत नव्हती.त्याबरोबरच,अरबी गणितज्ञांनीच शून्य निर्माण केलं आणि अरब व्यापाऱ्यांनी ते पश्चिमेकडे त्याचबरोबर पूर्वेकडे नेलं,ही शक्यतासुद्धा होतीच.जोपर्यंत आधीच्या शतकांतले शून्याचे पुरावे मिळत नाहीत,तोपर्यंत हिंदूंनी शून्याचा शोध लावला,या म्हणण्याला अर्थ नाही,असं ॲक्झेल यांना वाटत होतं.सिंधू संस्कृतीत शून्य वापरलं जात असेलही;पण जोपर्यंत त्यांच्या लिपीचा उलगडा होत नाही, तोपर्यंत भारतातल्या लिखित पुराव्यावरून अरबी व्यापाऱ्यांनी शून्य पाश्चात्त्य देशांत नेलं असं म्हणायला वाव नव्हता.यानंतर अमीर ॲक्झेल भारतातून परतले खरे,पण ते असमाधानी होते.' शून्याच्या मुळाशी जाण्यात अपयशी ठरलो ' हे सत्य स्वीकारणं त्यांना जड जात होतं. हिंदू-अरब आकड्यांकडे पूर्ण दुर्लक्ष करून जगात इतरत्र असलेल्या आणि आता कालौघात नष्ट झालेल्या इतर गणनपद्धतींबाबत विचार करावा किंवा हे सर्व सोडून दुसराच एखादा संशोधन प्रकल्प हाती घ्यावा याचा ते विचार करू लागले.

त्यांच्या पत्नीला त्यांची अस्वस्थता कळत होती. त्यामुळे इतर गणनपद्धतींचा अभ्यास करण्याच्या नव्या प्रकल्पांचा ॲक्झेलने विचार करायला हवा,असं तिलाही वाटत होतं.

अमीर यांनी या सूचनेस मान देऊन युरोपातील एटुस्कन संस्कृतीच्या गणनपद्धतीचा अभ्यास करायचं ठरवलं.ही संस्कृती इ.स.पूर्व आठव्या शतकात उदयास आली आणि इ.स.पूर्व तिसऱ्या शतकात लयास गेली.पण त्या अभ्यासात अमीर यांचं मन रमत नव्हतं.ही बाब त्यांच्या पत्नीच्या लक्षात आलीच.दोघंही नोकरी करत असल्यामुळे आठवड्यातील एका ठराविक दिवशी दुपारी ते एकत्र येऊन जेवण घेत असत.त्या वेळी ॲक्झेल यांची पत्नी म्हणाली, "अमीर, तू परत भारतात जा आणि ग्वाल्हेरच्या शून्याबद्दल माहिती मिळवायचा प्रयत्न कर.'

अमीर कामाला लागले.बिल कॅसलमन नावाच्या एका गणितीने ग्वाल्हेरच्या शून्याचा अभ्यास करून त्याबद्दल बरीच माहिती मिळविल्याचं अमीर यांच्या लक्षात आलं. हे कॅसलमन ब्रिटिश कोलंबिया विद्यापीठात प्राध्यापक होते. त्यांनीही आकड्यांवर बरंच संशोधन केलं होतं. अमीर यांनी कॅसलमनशी दूरध्वनी - मैत्री प्रस्थापित केली.

कॅसलमननी त्यांच्याजवळच्या माहितीचा खजिनाच उघडला आणि अमीरना  नवा मार्ग दाखवला.त्यांनी सांगितलं, "जॉर्ज कोडेस या फ्रेंच पुरातत्त्ववेत्त्याने ग्वाल्हेरच्या आधीच्या काळातलं शून्य कंबोडियामध्ये पाहिल्याचं फार पूर्वीच लिहून ठेवलं होतं.तेव्हा अमीरने भारतात न जाता कंबोडियात जाऊन या शून्याबद्दल अधिक माहिती मिळवावी." लोट्झीने ॲक्झेल लहान असताना ज्या फ्रेंच पुरातत्त्ववेत्त्याबद्दल सांगितलं होतं त्याच्याबद्दलच कॅसलमन बोलत होते.ते ऐकल्यावर अमीरना बऱ्याच गोष्टी आठवल्या आणि इतके दिवस त्या विस्मरणात गेल्याबद्दल पश्चात्तापही झाला.एके ठिकाणी ते प्रांजळपणे लिहितात, 'मी असा कसा वागलो? मी कित्येक वर्ष शून्याचं मूळ शोधायचा प्रयत्न करत होतो.

माझ्या टेबलावर जॉर्ज इफ्राचं 'द युनिव्हर्सल हिस्टरी ऑफ नंबर्स' हे पुस्तक हाताशी लागेल असं ठेवलेलं होतं.


त्यात कोडेस यांच्या कार्याचे अनेक संदर्भ आहेत.लोट्झीने मला योग्य ती दिशा पूर्वीच दाखवली होती.मीच तिकडे दुर्लक्ष केलं होतं.' कोडेस ही एक वल्ली होती.तो गणिती नव्हता, तर पुरातत्ववेत्ता आणि भाषाशास्त्रज्ञ होता.मात्र, गणित अभ्यासक सोडले तर तो फारसा कुणाला ठाऊक नव्हता;तेसुद्धा गणिताचा इतिहास त्याने जगापुढे आणला म्हणून स्वतः गणितज्ञ नसताना त्याने गणिताच्या इतिहासाचं ज्ञान जगाला दिलं होतं.त्याला अनेक भाषांचं सखोल ज्ञान होतं. बारीक बारीक गोष्टींची माहिती घेऊन त्यातून तो अर्थपूर्ण निष्कर्ष काढत असे.वेगवेगळ्या घटकांचे परस्परसंबंध काय असावेत हे जाणून घेण्याची अनोखी दृष्टी त्याला प्राप्त होती. पूर्वगृहदूषित वृत्तीने निष्कर्ष काढून ते जगासमोर मांडणाऱ्या अनेक विद्वानांचं पितळ त्याने उघडं पाडलं होतं.कारण तो खरा इतिहासप्रेमी होता. ग्वाल्हेर इथल्या शून्याच्या किती तरी आधीच लिखित शून्य त्याने जगासमोर आणलं होतं. त्यामुळे आकड्यांच्या इतिहासावर नवा प्रकाश पडला होता.कोडेसचं हे काम दुसऱ्या महायुद्धापूर्वीचं होतं.

दुसऱ्या महायुद्धानंतर कंबोडियात बरीच उलथापालथ झाली होती. विसाव्या शतकाच्या उत्तराधांत 'ख्मेर रुज' नावाच्या संघटनेने कंबोडियावर ताबा मिळवला होता.

त्यांनी वीस लाख नागरिकांची खुलेआम कत्तल केली होती.अनेक पुरातन पुतळे फोडून त्यांनी त्याची खड़ी करून रस्त्यांवर भर म्हणून वापरली होती.त्यामुळे ज्या शिलालेखात सर्वांत प्राचीन लिखित शून्य कोडेस यांनी पाहिलं होतं तो शिलालेख तरी शिल्लक आता असेल का, हा प्रश्न अमीर यांना सतावत होता. मेकाँग नदीकाठी असलेल्या सांबोर नावाच्या गावी कोडेसना हा शिलालेख १९२५ च्या आसपास मिळाला होता. त्यांनी त्या दोन शिळांना के १२७ आणि के- १२८ हे क्रमांक दिले होते.


अनेक ई-मेल आणि अनेकांकडे चौकशा करून अमीर यांना अँडी ब्रोअर नावाच्या कंबोडियात स्थायिक असलेल्या माणसाचा दूरध्वनी क्रमांक मिळाला.अँडीला भेटायला अमीर ॲक्झेल नॉमपेन्हला पोहोचले.त्यांनी अँडीला शिलालेखाबद्दल सांगितलं.सध्या तो कुठे आहे हे शोधायला मदत करावी,अशी विनंतीही त्यांनी अँडीला केली.अँडी आणि अमीर दोघांनी काही जाणकार बौद्ध भिक्खूंची मदत घ्यायचं ठरवलं. त्यासाठी अमीर यांना लुआंग प्रबांग या शहरी जावं लागणार होतं.

दरम्यान,अँडीने रोटानाक यांग नावाच्या मित्राची भेट घ्या,असं अमीर यांना सुचवलं.यांगचा पुरातन वस्तूंचा अभ्यास होता. के-१२७ आणि के-१२८ हे दोन शिलालेख दुसऱ्या महायुद्धपूर्व काळात नॉमपेन्ह इथल्या राष्ट्रीय वस्तुसंग्रहालयात शिलालेख विभागात होते,असं यांगने अमीरना सांगितलं;पण तिथेही त्यांना एक सुंदर वस्तुसंग्रहालय बघितल्याचं समाधान मिळालं एवढंच.

त्यांच्या कामात कोणतीही प्रगती झाली नव्हती.

अमीर बँकॉकला परतले.बँकॉकमध्ये नुसतं बसून राहण्यापेक्षा अँडीने सुचवल्याप्रमाणे लाओसमध्ये जाऊन यावं,तोपर्यंत अँडी किंवा इतर कुणी जाणकार काही संदेश पाठवेल त्यावर नंतर काम करावं,असं त्यांनी ठरवलं.

त्यांनी आपल्या पत्नीला,डेब्रालाही तिथे बोलावून घेतलं.

दोघं मिळून लुआंग प्रबांगला गेले.तेथील झिआँग थाँग या पॅगोडात एका भिक्खूला अमीर यांनी प्रश्न केला, "शून्यत्व म्हणजे काय ?" या प्रश्नाला त्या भिक्खूने विस्तृत उत्तर दिलं.ते विवेचन ऐकून अमीर यांची खात्री पटली,की इतका खोलवर विचार करणाऱ्या प्राचीन लोकांनीच 'शून्य' आणि 'अनंत' अशा कल्पना केल्या असणार.

ॲक्झेल पती-पत्नी बँकॉकला परतले.तिथे रोतानाक यांगचा संदेश त्यांची वाट पाहत होता. यांगचे वडील 'अंगकोर जतन संस्थे'चे संचालक होते.त्यांना इंग्रजी येत नव्हतं.त्यांच्या संस्थेत अनेक कंबोज शिलालेख,पुतळे आणि इतर वस्तू जतन करून ठेवलेल्या होत्या.

इ.स.१९९० मध्ये ख्मेर रुजच्या गुंडांनी यातल्या बऱ्याच गोष्टी लुटल्या होत्या.त्या पैशासाठी त्यांनी परदेशात पाठवल्या होत्या किंवा तोडून तरी टाकल्या होत्या.तिथे पूर्वी के १२७ असण्याची शक्यता होती. त्यासंबंधी - अधिक माहिती फक्त शासकीय सांस्कृतिक मंत्रालयच देऊ शकत होतं. ती परवानगी मिळायला काही काळ जावा लागला.के-१२७ च्या अखेरच्या ज्ञात आश्रयस्थानाला आता भेट देणं बाकी होतं. ठरलेल्या वेळी अमीर त्या संग्रहालयात पोहोचले. संग्रहालयाचे संचालक वृद्ध होते.त्यांनी संग्रहालयाच्या दयनीय स्थितीबद्दल माफी मागितली.असंख्य तोडक्या मोडक्या पुतळ्यांचे तुकडे तिथे पडून होते.कित्येक शिलालेख भग्न अवस्थेत कसेबसे तग धरून होते.संग्रहालयात पंखे नव्हते.खूप उकडत होतं.अमीरने एक-एक शिळा तपासायला सुरुवात केली.अखेरीस घामाने डबडबलेल्या स्थितीत त्यांनी पुतळ्यांच्या मागील बाजूस ठेवलेल्या शिलालेखांची तपासणी करायचं ठरवलं. इथे त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. त्यांनी तपासायचं ठरवलेल्या पहिल्याच शिलालेखावर के-१२७ क्रमांक होता.क्षणभर अमीर यांचा आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसेना.एक मोठ्ठा तांबूस खडकाचा तुकडा होता तो. त्यावर ख्मेर लिपीत ६०५ हा आकडा कोरलेला होता.त्यातलं शून्य आपण पाहतो तसं गोलाकार नव्हतं.ते नुस्तंच एक टिंब होतं.मुख्य म्हणजे

तो आकडा आणि तो ज्या मजकुराचा भाग होता त्या मजकुराचं कसलंही नुकसान झालेलं नव्हतं.सर्व मजकूर आणि तो आकडा स्पष्ट दिसत होते.इतकी वर्षं शून्याचा शोध घेत फिरल्यावर आता ते सापडलं तर पुढे काय करावं.हे अमीरना सुचेना या शोधात त्यांना अनेकांची मदत झाली होती.कंबोडिय शासनातील सांस्कृतिक विभागाचे प्रमुख सचिव हाब टच, स्लोन फाउंडेशन या दोघांनी तर त्यांचा भार खूपच हलका केला होता.आणि अखेरीस अमीर ॲक्झेल त्या ज्ञात आद्य शून्याजवळ उभे होते. पण इथेच त्यांच्या हातून एक चूक झाली.'मला आद्य शून्य सापडलंय' हे जगाला सांगायच्या आधी जी काळजी घ्यायला हवी ती त्यांनी घेतली नाही.


ते के-१२७ कडे भक्तिभावपूर्वक आदराने आणि विस्मयाने बघत असताना तिथे दोन इटालियन स्त्रिया आल्या.आपण जे शोधत होतो ते सापडल्याचा आनंद बोलून दाखवावा,

या हेतूने त्यांनी या महिलांना त्या शिळेबद्दल सांगितलं. त्यांच्यापैकी एकीने हातातली काठी त्या शिळेवर मारली. "हे सांगितलंत ते बरं केलंत.आम्ही अशीच एखादी शिळा शोधत होतो. पुरातत्वशास्त्राच्या विद्यार्थ्यांना पुरातन गोष्टी पूर्ववत कशा करायच्या याचं प्रशिक्षण द्यायचंय, त्यासाठी ही शिळा अगदी योग्य वाटते." अमीर त्या कल्पनेने हादरले इतका महत्त्वाचा शिलालेख शिकाऊ विद्यार्थ्यांच्या हाती पडणार,ही कल्पनाच त्यांना सहन होत नव्हती.त्यांनी त्या महिलांना समजवायचा खूप प्रयत्न केला,पण व्यर्थ! शेवटी बँकॉकला परत येऊन अमीर ॲक्झेल यांनी कॅसलमनची मदत घेतली.त्या दोघांच्या बऱ्याच प्रयत्नांनंतर आणि पत्रापत्रीनंतर त्या महिलांनी 'के- १२७ ला हात लावणार नाही,'असं ई- मेलने अमीर यांना कळवलं.पुढेही अनेक प्रयत्न करून अमीर यांनी तो शिलालेख वाचवला.


एखाद्या गोष्टीचा ध्यास घेतला की माणूस काय करू शकतो याचं दर्शन हे पुस्तक वाचताना होतंच,पण आकड्यांच्या इतिहासाचीही माहिती आपल्याला सहजगत्या मिळते.गणिताशी संबंध नसलेल्या व्यक्तीलाही हे पुस्तक गुंगवून टाकेल यात शंकाच नाही. 


२०.८.२३ या लेखातील शेवटचा भाग.. लेख संपला.

२०/८/२३

शोध 'शून्या'च्या उगमाचा - The search for the origin of 'zero' - Amir Axel

अंकशास्त्रात अत्यंत महत्त्वाचा असणारं 'शून्य' कुणी आणि कसं शोधलं याचं कोडं इस्त्रायली गणितज्ज्ञ अमीर ॲक्झेल यांना लहानपणापासून पडलं होतं.गणिताचा अभ्यास करतानाच या शून्याच्या उगमाचा पुराव्यासकट शोध घेण्याचा ध्यास त्यांनी घेतला.त्यासाठी जगभर उभा आडवा प्रवास केला.शून्याबरोबरच वेगवेगळ्या प्राचीन संस्कृतींतील गणनपद्धतीच्या इतिहासाचाही शोध घेणाऱ्या ॲक्झेल यांचा हा रोमांचक प्रवास.


भारतीय तत्त्ववेत्ता ब्रह्मगुप्त याने शून्याचा शोध लावून अंकगणितात बहुमूल्य भर टाकली,असं आपण आजपर्यंत ऐकत आलो आहोत आणि साऱ्या जगाला अभिमानाने सांगतही आलो आहोत.भारतात पाचव्या किंवा सहाव्या शतकात शून्याची संकल्पना अस्तित्वात आली,मग अरबांमार्फत व्यापाराच्या माध्यमातून ती युरोपात पोहोचली,असेच उल्लेख आजपर्यंत आपण ऐकले.मात्र,एवढ्या माहितीवर अमीर ॲक्झेल नावाच्या

एका इस्त्रायली गणितज्ञाचं समाधान झालं नाही.त्यांना स्वत:च्या डोळ्यांनी शून्याच्या उगमाचा ठोस पुरावा पाहायचा होता. लहानपणापासून हा एकच ध्यास बाळगून असलेल्या ॲक्झेल यांनी त्यासाठी अनेक देशांतून वेडावाकडा प्रवास केला. 'फाइंडिंग झीरो' हे त्यांचं पुस्तक एखाद्या गोष्टीचा ध्यास घेतला की तो पूर्ण करण्यासाठी माणूस काय काय करू शकतो याचीच प्रचिती देतं.

आपल्याला वाटतं त्यापेक्षा आकडे आणि गणनप्रक्रिया या खूप प्राचीन गोष्टी आहेत. झाँ द हिंझेलिन या बेल्जियन भूसंशोधकाला १९६० मध्ये सध्याच्या युगांडा आणि काँगोच्या सीमाप्रदेशात,'इशांगो' मध्ये एक जरा वेगळंच दिसणारं हाड सापडलं.ते बबूनच्या मांडीचं होतं. त्यावर बऱ्याच खुणा होत्या.त्या खुणा म्हणजे गणना करण्याची पद्धत असावी,असा अंदाज संशोधनानंतर बांधण्यात आला.हे हाड वीस हजार वर्षांपूर्वीचं,म्हणजे पुराश्मयुगीन काळातील आहे.त्यानंतर गणनपद्धतीत आपण आज वापरतो ते आकडे कसे जन्माला आले,प्रथम कशासाठी

वापरले गेले,हे रहस्य अजूनही अंकशास्त्रज्ञांना भुरळ पाडत असतं.ॲक्झेल देखील त्यातलेच एक.गणित आणि विज्ञानविषयक लेखन करणाऱ्या ॲक्झेल यांना आकड्यांच्या मुळाशी जायचं वेड होतं. वाचकालाही आपल्याबरोबर आकड्यांच्या शोधाची सफर घडवावी,

असं वाटत असल्यामुळे त्यांनी आकडे आणि इतर विषयांवर वीस पुस्तकं लिहिली. पहिलीत प्रवेश घेतलेल्या अमीर ॲक्झेल यांच्या वर्गात शिक्षिकाबाईनी प्रश्न विचारला, "शाळेत काय काय शिकणार ?" प्रत्येकजण आपापल्या मगदुराप्रमाणे उत्तर देत होता. छोट्या ॲक्झेलने उत्तर दिलं," हे आकडे येतात कुठून?" हा प्रश्न पुढेही ॲक्झेलच्या डोक्यात रुंजी घालत राहिला.

ॲक्झेलचे वडील एका आलिशान जहाजाचे कप्तान होते.हे जहाज हौशी प्रवाशांना भूमध्य सागरातील प्रेक्षणीय शहरांची सहल घडवून आणत असे.ते जहाज पुराणप्रसिद्ध कोर्फू,इबिझा,माल्टा या बेटांसह जुगारासाठी प्रसिद्ध असलेल्या माँटे कार्लोला भेट द्यायचं.कप्तानाला अधूनमधून त्याचा कुटुंबकबिला बरोबर न्यायची मुभा असायची.ॲक्झेल कुटुंबीयसुद्धा बऱ्याच वेळा अशा सफरीवर जात असत.त्यामुळे वर्षातला बराच काळ अमीर शाळेत जाऊ शकत नसे.मग हा बुडालेला अभ्यास भरून काढण्यासाठी त्याला खास शिकवणी लावली जायची.शिवाय जहाजावर तो रोज काही काळ स्वतः अभ्यास करत असे आणि घरी परतल्यावर शाळेची परीक्षा देत असे.हे जहाज मोनॅकोला पोहोचलं, की नांगर टाकला जायचा आणि एका जलद मोटरबोटीने जहाजावरचे प्रवासी आणि सेवकवर्ग किनाऱ्यावर पोहोचायचे.रात्री जहाजावरले बहुतेक प्रवासी तिथल्या माँटे कार्लोच्या कॅसिनोत हजेरी लावत असत.अमीर ॲक्झेल आणि त्याची बहीण इलाना यांना ते अल्पवयीन असल्यामुळे या जुगारी अड्ड्यात जाण्यास बंदी असायची.मग ही दोघं कॅसिनोच्या बाहेर जहाजावरील काही नोकरांबरोबर किंवा एकमेकांशी खेळत वेळ काढत असत.अमीरच्या वडिलांचा एक वैयक्तिक सहायक होता,त्याचं नाव 'लोट्झी'.त्याच्याबरोबर राहण्यात दोघांना मजा यायची.कॅसिनोच्या आत काय काय चालू असेल,

याबद्दल ती दोघं फक्त कल्पनाच करू शकायची.पण एक दिवस त्यांचं नशीब खुललं. एक दिवस लोट्झीने कॅसिनोच्या दरबानाला सांगितलं,की 'मुलांना त्यांच्या आईकडे ताबडतोब न्यायला हवं,काही तातडीची गरज उद्भवली आहे.'आणि उत्तराची वाट न पाहता तो मुलांना घेऊन सरळ कॅसिनोच्या आत शिरला. 

कॅसिनोत मुलांना प्रवेश नसतो,त्यामुळे कुठल्याही क्षणी आपल्याला गचांडी धरून रस्त्यावर फेकून देण्यात येईल,ही भीती अमीरला सतावत होती.पण तसं काही घडलं नाही. कॅसिनोत मोठमोठाली टेबलं होती.त्यांवर मोठमोठे आकडे लिहिलेले होते.पलीकडे मोठ्या घमेल्यासारखं एक चक्र होतं.त्यातही आकडे होते.

टेबलांवरचे आणि त्या फिरत्या चक्रातले आकडे एकसारखेच होते.चक्र फिरू लागलं की त्यात चेंडू टाकला जात होता.अमीरला त्या आकड्यांची भुरळ पडली.चक्रात चेंडू फिरता फिरता सात आकड्याच्या खाच्यात पडला.'ही तर एक अविभाज्य संख्या आहे.' लोट्झी म्हणाला. अमीरला त्या वाक्याचं कुतूहल वाटलं. लोट्झीकडे नेहमीच काही तरी महत्त्वाची माहिती असायची तशीच याबाबतही असणार,हेअमीरने ओळखलं. यानंतर त्या जहाजाच्या सफरीत लोट्झीने ॲक्झेल यांना गणिताचे प्राथमिक धडे द्यायला सुरुवात केली.

एक दिवस ॲक्झेल यांनी लोट्झीला विचारलं, "हे आकडे कुठून आले? ते कुणी तयार केले ?" "खरं सांगायचं तर ते कुणालाच ठाऊक नाही." लोट्झी म्हणाला,"मला जेवढी माहिती आहे त्यानुसार युरोपात जे आकडे वापरले जातात त्यांना 'अरबी आकडे' म्हणतात.मुळात ते 'हिंदू आकडे' आहेत म्हणे.त्यामुळे काही वेळा त्यांना हिंदू-अरबी असंही म्हटलं जातं.मागे एकदा तुझ्या वडलांबरोबर मी अरबी बंदरात थांबलो होतो त्या वेळी मी

तिथे वापरण्यात येणारे आकडे उतरवून घेतले,पण आपण वापरतो त्या आकड्यांमध्ये आणि अरबांच्या वापरातल्या आकड्यांमध्ये 'एक' हा आकडा सोडला तर कसलंच साम्य नाही.' ॲक्झेल यांच्या बालमनात आकड्यांबद्दलचं कुतूहल अशा तऱ्हेने चाळवलं गेलं.यानंतर जेव्हा 

ॲक्झेल जहाजावर सफरीला गेले त्या वेळी जहाज ग्रीसला गेलं.इथे लोट्झीने अमीर यांना ग्रीक आकड्यांची आणि ग्रीकांनी गणितात केलेल्या प्रगतीची माहिती दिली.'ग्रीक लोक आकड्यांसाठी अक्षरं वापरायचे.त्यांना 'शून्य' माहीतच नव्हतं.तरीही ग्रीकांनी इ.स.पूर्व पाचव्या शतकात मोठमोठी बांधकामं केली.प्रचंड इमारती उभारल्या.' जहाज पाँपेईला पोहोचलं त्या वेळी लोट्झीने अमीर यांना रोमन आकड्यांचा परिचय करून दिला.तेही आकड्यांसाठी अक्षरंच वापरत आणि त्यांनाही शून्य माहीत नव्हतं;पण त्यांनी भूमितीत अचंबा वाटावी अशी प्रगती केली होती. लोट्झीकडून ॲक्झेल यांना अशी बरीच माहिती मिळत गेली.'लोट्झीने मला गणिताबद्दलची जेवढी माहिती दिली तेवढी आणि तशी माहिती मला शाळेत कधीच मिळाली नसती.त्या गणितप्रेमीमुळे माझं आकड्यांबद्दलचं प्रेम वाढीस लागलं,' असा उल्लेख अमीर ॲक्झेल आवर्जून करतात. प्राथमिक पदवी (मॅट्रिक) मिळवल्यानंतर अमीर यांनी इस्रायली लष्करात सक्तीची सेवा केली. त्यानंतर १९७२ मध्ये त्यांना बर्कले इथल्या कॅलिफोर्निया विद्यापीठात गणित विषयात पदवीचं शिक्षण घेण्याकरिता प्रवेश मिळाला.

अमेरिकेकडे प्रयाण करण्यापूर्वी निरोप देताना लोट्झी त्यांना म्हणाला, "तू अगदी लहान असताना माझ्याकडे 'आकडे कुठून आले' अशी विचारणा केली होतीस,

आठवतं? कदाचित तुला ते अमेरिकेत कळू शकेल.मागे एकदा मी एका वैज्ञानिक नियतकालिकामध्ये काही माहिती वाचली होती.एका फ्रेंच पुरातत्त्वज्ञाने आशियामध्ये आकड्यांच्या उगमाबद्दल काही पुरावे मिळवले होते,असं त्यात लिहिलं होतं. शून्यासंबंधीचं ते संशोधन प्रसिद्ध झालं त्याला एक तप तरी होऊन गेलं असेल बघ.मला नक्की आठवत नाही.माहिती मिळाली तर बघ!" कॅलिफोर्निया विद्यापीठातून शिक्षण पूर्ण करून अमीत गणित आणि सांख्यिकी विषयाचे प्राध्यापक बनले.लग्न करून ते बोस्टनला राहू लागले.पुढे २००८ मध्ये डॉ.अँड्रेस रोयमर नावाच्या मेक्सिकोत राहणाऱ्या जुन्या दोस्ताच्या आमंत्रणामुळे अमीत मेक्सिको सिटीत गेले. तिथल्या वस्तुसंग्रहालयाला ॲक्झेलनी भेट द्यावी असं रोयमरना वाटत होतं.या संग्रहालयाची भेट ॲक्झेल यांच्यासाठी टर्निंग पॉइंट ठरली.संग्रहालयाच्या दारातून आत शिरल्याबरोबर समोर एक वर्तुळाकृती दगड होता.बारा फूट व्यासाच्या या पाषाण वर्तुळाचं वजन चोवीस (ब्रिटिश) टन होतं.त्याच्या मध्यभागी ॲझ्टेक

सूर्यदेव-टोनातिऊचा चेहरा होता.ही प्राचीन दिनदर्शिका असावी असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. माया संस्कृतीत तर याहूनही जुने म्हणजे इ. स. पूर्व ३७००च्या सुमाराचे चित्रलिपीतले आकडे सापडतात.संग्रहालयातील माया आणि ॲझ्टेकांची चित्रलिपीतील आकडेमोड बघून ॲक्झेल यांना पुन्हा एकदा आकड्यांचं मूळ शोधावंसं वाटू लागलं.आकड्यांचं मूळ भारतात आहे,हे लोट्झीने

खूप आधीच सांगितल्याचं त्यांना आठवलं.त्यामुळे त्यांनी भारतात जायचं नक्की केलं.त्याआधी त्यांनी भारताची जास्तीत जास्त माहिती मिळवायचा प्रयत्न केला.भारतात जाऊन आलेल्या मित्रमंडळींशी चर्चा केली.हिंदू, बौद्ध आणि जैन धर्म,भारतीय संस्कृती, भारतातील प्रमुख भाषा वगैरे बाबींवर त्यांनी सुमारे वर्षभर वाचन केलं.या वाचनाच्या केंद्रस्थानी भारतीय तत्त्वज्ञान आणि गणित हे विषय होते.या वाचनातून ॲक्झेल यांची खात्री पटली,की भारतीय माणसालाच सर्वप्रथम 'शून्य' आणि 'अनंत' या संकल्पना सुचल्या असणार. कारण इतका अमूर्त विचार युरोपियन माणसाला करता येणं शक्य नव्हतं.पुढे कधी तरी या संकल्पना अरबांकडून युरोपात आल्या आणि रुजल्या असाव्यात,आणि त्याआधारे खरं तर पाश्चात्त्य प्रगतीचा पाया घातला गेला असावा अशी त्यांना खात्रीच वाटू लागला.१० जानेवारी २०११ रोजी अमीर दिल्लीत येऊन पोहोचले.त्यांच्याजवळ सी.के.राजू या प्राध्यापकांचा पत्ता होता.२००९ मध्ये सिडनीत 'विज्ञानाच्या इतिहासा संबंधी एक चर्चासत्र झालं होतं.

या चर्चासत्रात प्रा.राजूंच्या निबंधामुळे प्रचंड खळबळ आणि वादावादी झालेली होती.याचं कारण 'पाश्चात्त्य ज्या संकल्पना ग्रीक गणितींनी प्रथम मांडल्या असं म्हणतात त्या सर्व संकल्पना ग्रीकांनी 'भारतीयांकडून मिळवल्या होत्या', असं राजूंनी या चर्चासत्रात ठामपणे म्हटलं होतं. त्याबद्दल राजूंची टिंगलटवाळीसुद्धा झालेली होती. तेव्हापासून अमीर आणि प्रा.राजू परस्परांच्या संपर्कात होते.त्या ई-मैत्रीचं रूपांतर आता प्रत्यक्ष भेटीत झालं होत.अमीर यांना राजूंचा ठामपणा,त्यांच्या निबंधाची मांडणी आणि बोलण्यातील ऋजुता आवडली होती. राजूंनी मांडलेला एक मुद्दा त्यांना खूप महत्त्वाचा वाटत होता.राजूंच्या म्हणण्यानुसार पायथागोरस भारतात येऊन गेला असण्याची शक्यता नाकारता येत नव्हती.


तो इजिप्तला भेट देऊन आला होता,फिनिशियात जाऊन आला होता. ज्ञानार्जनाकरता भटकणं त्याला कमीपणाचं वाटत नसे.त्या काळात व्यापारी काफिले भारतातून अरबस्तानमार्गे ग्रीसपर्यंत ये-जा करत. त्यांच्याबरोबर प्रवासीही असत.(आपण 'यवन' हा शब्द वापरतो तो 'आयोनीज' या शब्दाचं अपभ्रष्ट रूप आहे.आयोनिया हा प्राचीन ग्रीसचा एक भूभाग.) अशा भटकंतीत पायथागोरस तक्षशिलेस येऊन गेला असावा,असं राजूंचं म्हणणं होतं.ते तर्काधिष्ठित असलं तरी त्यासाठी ठोस पुरावा उपलब्ध नव्हता. भारतातल्या या भेटीत प्रा.राजूंनी अमीर यांना एक पुस्तक दाखवलं.त्यात पुढील ओळी होत्या.


'कुठलीही गोष्ट एक तर खरी असते किंवा नसते तरी. ती एकाच वेळी खरी आणि खोटीही असू शकते,किंवा खरी नसली तरी खोटीही नसू शकते,ही बुद्धदेवाची शिकवण आहे.'हे वाचून ॲक्झेल चक्रावले." ( हटके भटके,निरंजन घाटे,समकालीन प्रकाशन,पुणे ) हे पुरातन तत्त्वज्ञ नागार्जुनाचं वचन आहे. 


हे सगळं समजावून घ्यायचं असेल तर त्यासाठी काही काळ पूर्वेचं तत्त्वज्ञान आत्मसात करण्याचे प्रयत्न करावे लागतील." राजूंनी सांगितलं.मग अमीर  यांना राजूंनी भारतीय तत्त्वज्ञानाचे धडे द्यायला सुरुवात केली.राजूंच्या मते त्या वचनाचा अर्थ 'शून्य' असा होता.ते ब्रह्मांडाच्या पोकळीचं वर्णन होतं.शून्याचा शोध घेण्यासाठी अमीर यांना राजू यांनी जपानी गणितज्ञ टाकाओ हायाशी यांचा संदर्भ दिला काही काळापूर्वी हायाशींनी खजुराहो इथे काही अंकांची छायाचित्रं घेतली होती.त्यांनी या आकड्यांबाबत जरी विस्तृतपणे लिहिलं असलं तरी एक गोची होती.ज्या मंदिरावर त्यांना हे आकडे कोरलेले सापडले होते त्याचं नाव त्यांनी जाहीर केलं नव्हतं.

खजुराहोत एकूण ८५ मंदिरं होती.त्यातली बहुतेक निसर्गप्रकोपामुळे पडझड झालेल्या स्थितीत असली तरी वीस मंदिरं अजूनही सुस्थितीत होती.डेव्हिड युजिन स्मिथ यांनी गणिताच्या इतिहासावर लिहिलेल्या आपल्या एका पुस्तकात म्हटलं आहे,की 'खजुराहो इथल्या एका मंदिरावर एक जादुई चौकोन (मॅजिक स्क्वेअर) कोरलेला आढळतो. ही मंदिरं ८७० ते १२०० या काळातली आहेत.' अमीर यांना वाटत होतं की हायाशी हाच मजकूर वाचून खजुराहोला पोहोचले असावेत;पण तसं नव्हतं.भारतात पुरातत्त्व विद्येचा पाया घालणाऱ्या सर अलेक्झांडर कनिंगहॅम यांनी इ.स.१८६० च्या दशकातच खजुराहोच्या मंदिरांचा अभ्यास करताना सर्वप्रथम हा गणिती चौकोन बघितला होता आणि त्याची नोंद केली होती.त्या नोंदी वाचून हायाशी खजुराहोत पोहोचले होते.अमीर यांनी दहाव्या शतकापासून मागे जात शोध घ्यायचं ठरवलं.खजुराहोत पोहोचल्यानंतर त्यांनी तिथे बरीच देवळं बारकाईने बघितली,

स्थानिकांजवळ आणि प्रवासी मार्गदर्शकांकडे चौकशी केली;पण त्यांना त्या चौकोनाची माहिती मिळेना.अमीर त्या चौकोनाची चौकशी करत असताना जवळच काही फ्रेंच प्रवासी मंदिर बघत होते.त्यांतल्या एकाने पूर्वेकडच्या मंदिरांच्या समूहामध्ये एका मंदिराच्या दाराच्या चौकटीवर एका चौकोनात आकडे बघितले होते.हा मंदिरसमूह गावाच्या दुसऱ्या टोकाला होता.तिकडे सहसा कुणी जात नसे,कारण त्या मंदिरांची बरीच पडझड झाली होती.ते ऐकून अमीर ॲक्झेल त्या दिशेने निघाले. ते विवक्षित मंदिर शोधायला त्यांना थोडा वेळ लागला.ते इ. स. ९५४ मध्ये उभारलेलं पार्श्वनाथाचं देऊळ होतं.अखेरीस त्या मंदिरात अमीर यांना तो चौरस सापडला.


७  १२  १ १४


२  १३  ८  ११


१६  ३  १०  ५


९   ६  १५   ४


या चौरसातील सर्व उभ्या आणि आडव्या ओळींतील आकड्यांची बेरीज ३४ आहे.दोन्ही कर्णांवरील संख्यांची बेरीजही ३४ येते.तसंच या चौरसात एकही आकडा पुन्हा वापरला नाही.


अभ्यासपुर्ण व वैचारीक लेखातील शिल्लक भाग पुढील लेखामध्ये..

१८/८/२३

मुन्नी एक गोष्ट जगण्याची-Munni teaches to live..

रविवारची दुपार होती.भरपेट जेवण करून पेपर वाचत पडलो होतो.तेवढ्यात फोन वाजला.वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पुण्यात काही दरवेश्यांना चार अस्वलांसह पकडलं होतं.त्या अस्वलांना पेशवे पार्कमध्ये नेलं गेलं.

डॉ.विनय गो-हे यांनी तीन अस्वलं पेशवे पार्कमध्ये ठेवून घेण्याची तयारी दाखवली.मग चौथं अस्वल आमच्या पार्कमध्ये घ्यावं,अशी विनंती करण्यासाठी वन अधिकाऱ्यांनी मला फोन केला होता.मी ताबडतोब आयुक्त बंगल्यावर फोन लावला.रवींद्र सुर्वे नावाचे एक कार्यतत्पर अधिकारी त्या वेळी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त होते.त्यांनी लगेगच हे अस्वल मर्यादित कालावधीसाठी ठेवून घेण्याची परवानगी दिली.

आम्ही ताबडतोब पेशवे पार्क गाठलं.चारही अस्वलं खाऊन-पिऊन मजेत झाडाच्या सावलीत आराम करत होती.त्यांना सांभाळणारे दरवेशीही तिथेच बसून होते.त्या अस्वलांमधल्या मध्यम बांध्याच्या बोलक्या डोळ्यांच्या,

अत्यंत देखण्या मादीने माझं लक्ष वेधून घेतलं.पाहताक्षणी तिलाच सोबत न्यायचं असं मी ठरवून टाकलं.

वनाधिकाऱ्यांच्याच जीपमधून तिला पार्कमध्ये आणलं.

दुर्गा टेकडीवरून आणलेले दोन मोठे आणि एक छोटा पिंजरा जोडून तिच्यासाठी तात्पुरता पिंजरा तयार केला आणि तिला त्यात सोडलं.आल्या आल्या तिला केळी,

सफरचंद आणि दूध मिसळून छान शिकरण खायला दिलं.हा खाऊ आवडीने गट्टम करून ती झोपी गेली.तिचा मालकही तिच्यासोबतच आमच्याकडे आला होता. तो माझ्याच वयाचा आणि माझ्यासारखीच दाढी असलेला माणूस होता.माझ्या शिफारशीनुसार आयुक्त सुर्वेसाहेबांनी त्याला कायमस्वरूपी नोकरीवर घेण्याची तयारी दर्शवली.

पण त्याला काय वाटलं कोण जाणे,तो दुसऱ्याच दिवशी निघून गेला.आमच्याकडे आलेल्या अस्वलीचं नाव होतं सिमरन,दरवेशी तिला लाडाने मुन्नी म्हणत असे.मुन्नी त्याच्या मुलांसोबत त्यांच्या कुटुंबातच वाढली होती.

त्यांच्यासोबतच गावोगाव फिरत होती.बघ्यांसाठी खेळ करत होती.त्यांचं भटके घर चालवण्यासाठी मेहनत करत होती. हीच मुन्नी आता आमच्या पार्कची सदस्य झाली होती.वास्तविक यापूर्वी माझा आणि अस्वलाचा काहीच संबंध आला नव्हता.प्राणिसंग्रहालयात किंवा दरवेशांसोबत पाहिलं असेल तेवढंच.जर्सीमध्ये दक्षिण अमेरिकी 'स्पेक्टॅकल्ड बेअर'च्या प्रजोत्पादनाचा प्रोजेक्ट जवळून पाहण्याचं भाग्य मला लाभलं होतं;पण तिथेही माझा त्या प्रकल्पात प्रत्यक्ष सहभाग नव्हता.तसं पाहिलं तर अस्वलाशी माझं अप्रत्यक्ष नातं जुळलं ते दुर्गा भागवतांमुळे.त्यांचं 'अस्वल' हे पुस्तक मला अतिशय आवडून गेलं होतं.दुर्गाबाईंनी किती विलक्षण बारकाईने अस्वलांच्या सवयी आणि स्वभावाचं रेखाटन त्यात केलं आहे!अस्वलांच्या जाती,त्यांची वसतिस्थानं,आहार- विहाराच्या सवयी, स्वभाववैशिष्ट्यं,अस्वलाची वागणूक इत्यादी. धिप्पाड देह असूनही अस्वल आळशी नसतं. उलट,ते अत्यंत कष्टाळू अन् मेहनती असतं. शूर आणि दांडगं असतं.बऱ्यापैकी चंचलही असतं.त्याच्या बुद्धिमत्तेबद्दल बऱ्याच ठिकाणी वाचनात आलं होतं.

त्यामुळे एकीकडे या प्राण्याबद्दल उत्सुकता होती आणि हा पूर्ण नवा ताकदवान लहरी प्राणी आपल्याला झेपेल ना,याची धाकधूकही वाटत होती.त्यातच रात्री प्रतिभाला मुन्नीने पिंजरा तोडल्याचं स्वप्न पडलं.उरलेली रात्र तिने जागून काढली.पहाट होण्याआधीच ती पिंजरा शाबूत असल्याची खात्री करून आली. सुदैवाने मुन्नीने असा कोणताही उद्योग केला नव्हता.आदल्या दिवशीच्या धावपळीमुळे ती थकून झोपून गेली असावी.सकाळी

उठल्यावर तिला दूध-पाव खायला घातला.

महानगरपालिकेच्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिच्या नाकातील वेसण कापून काढली.तिला औषधपाणी केलं.सुदैवाने कोणताही त्रास न होता मुन्नी आमच्या पार्कवर रुळली.एवढंच नव्हे,तर पार्कमधल्या आणि पार्कमध्ये येणाऱ्या बालगोपाळांचं ती आकर्षण बनली.

सुर्वेसाहेबानंतर पर्यावरणप्रेमी प्रवीणसिंह परदेशी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त झाले.त्यांनी आमच्या पार्कच्या विकासामध्ये खूपच रस घेतला.ते वरच्यावर सहपरिवार पार्कवर येत असत.त्यांची मुलंही सोबत असत. सगळी छोटी मंडळी पार्कमध्ये धमाल करत असत.विशेषतः मुन्नीसाठी फ्रुट सॅलड तयार करायचं आणि आम्हा कर्मचाऱ्यांपैकी कुणी तरी मुन्नीला ते खिलवत असताना पाहायचं,हा या बालस्वयंसेवकांचा आवडीचा उद्योग.बोराटे अण्णा हे मुन्नीचे पालक.त्यांनी भांडं स्वच्छ धुऊन त्यात दूध ओतलं की कुणी केळी,कुणी चिकू, कुणी इतर काही फळांचे तुकडे करून त्यात टाकत.

मग त्यावर मध ओतला की झालं मुन्नीचं 'फ्रुट सॅलड विथ हनी' तयार. पिंजऱ्यावर चढून बोराटे अण्णा सरकतं दार थोडंसं वर उचलायचे.अचूक टायमिंग साधून मी भांड पटकन आत सरकवायचो.दार खाली केलं की ओठांचा चंबू करून मुन्नी फ्रुट सॅलड भुरकणं सुरू करायची. खाऊन झाल्या झाल्या तिला लगेचच पाणी लागायचं.

त्याच भांड्यात आम्ही लगेच नळी धरत असू.खाणं-पिणं आटोपलं की पिंजऱ्याच्या मागच्या बाजूला स्लीपिंग सेक्शनमध्ये जाऊन लोळणं हा मुन्नीचा आवडता कार्यक्रम.कधी कधी ती नाठाळपणा करायची,पण एरवी तिचा दिनक्रम शांतपणे चालू असायचा.


मुन्नी वयात आली आणि तिच्यात नैसर्गिक बदल दिसू लागले.आता तिला जोडीदाराची गरज होती.विणीच्या हंगामात ती खूपच वैतागलेली असायची.अशा वेळी खाणं-पिणं तिच्यादृष्टीने दुय्यम असायचं.कधी कधी ती आवडीचं खाणंही उलटवून टाकायची पिंजऱ्याचे अर्धा इंची लोखंडी गजांचे वेल्डिंग पॉइंट्स तोडून,ते वाकवून थयथयाट करायची.तिच्यासाठी दररोज दूध, पाव,केळी,

सफरचंद,मनुका,खजूर,मध अशा अत्यंत संतुलित आहाराची,मेजवानीची सोय आम्ही करत असू.


पुढे केंद्र सरकारच्या आदेशानुसार मुन्नीला पेशवे पार्कच्या जागेतून कात्रज इथे स्थलांतरित झालेल्या राजीव गांधी पार्कमध्ये हलवण्यात आलं.तिथे तिला अनुरूप जोडीदार मिळाला.त्यांना मुलंबाळं झाली.आणि तीही तिथे आनंदात नांदली.मुन्नीला कात्रजला हलवल्यानंतर कित्येक दिवस दर मंगळवारी मी तिला भेटायला जात असे.तिच्या पिंजऱ्याजवळ जाऊन हाक मारताच ती खंदकाच्या भिंतीजवळ यायची आणि मागच्या पायावर उभी राहून माझ्याकडे बघत बसायची. बराच वेळ आम्ही एकमेकांना न्याहाळत असू. मी तिच्याशी बोलत असे;तीही मजेत ऐकत असे.मी खंदकापासून तिच्या नजरेआड होईपर्यंत ती माझ्याकडे बघत असायची.पुढे पुढे माझं जाणं-येणं कमी झालं,पण तरीही मुन्नी माझी ओळख विसरली नाही.माझा एक जुना मित्र खूप वर्षांनी नागपूरहून भेटायला आला होता.त्याला घेऊन मी प्राणिसंग्रहालयात फिरायला गेलो.


सवयीने अस्वलाच्या पिंजऱ्याजवळ गेलो आणि मुन्नीला हाक मारली.मुन्नी काही दिसली नाही.मला वाटलं,की कदाचित तिला माझी हाक ऐकू गेली नसेल किंवा ती विश्रांती घेत असेल.मी थोडा वेळ थांबलो.इतक्यात एक छोटं अस्वल अगदी मुन्नीसारखंच दोन पायांवर उभं राहिलं.घशातून खाकखूक केलं आणि निघून गेलं.यापूर्वी मुन्नी सोडून तिथल्या कोणत्याही अस्वलाने मला असा प्रतिसाद दिला नव्हता.मी मनात म्हटलं, 'हे नक्कीच मुन्नीचं पोर असणार.पण मुन्नी कुठेय?' माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकली.दुसऱ्याच दिवशी अस्वलांचा केअरटेकर कौशिक भेटला.तो म्हणाला "सॉरी सर,तुम्हाला सांगायचं राहून गेलं.गेल्या आठवड्यात मुन्नी गेली!"


पण त्याने बातमी सांगण्याआधीच मुन्नीच्या पिल्लाने तिचा निरोप माझ्यापर्यंत पोहोचवला होता..


पुण्याला परममित्र सतीश खाडे अभिनव जलनायक या पुस्तकाचे लेखक यांना भेटायला गेलो होतो.त्यावेळी त्यांनी भेट म्हणून भरपूर पुस्तके दिली.त्यातीलच एक  'सोयरे वनचरे',अनिल खैर,प्रकाशक - समकालीन प्रकाशन पुणे यांचे हे पुस्तक वाचत असताना.या कथेने घेतलेला मनाचा वेध..