* विजय गायकवाड | Vijay Gaikawad

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

१०/१२/२३

स्वतः व ईश्वर यांत जगाची वाटणी करणारा अलेक्झांडर..Alexander who divides the world between himself and God..

शइकडे प्लेटो आदर्शभूत राज्याची स्वप्ने खेळवीत असता,

तिकडे ग्रीक शहरे शुद्र व निरर्थक युद्धांनी व क्षुद्र वैरांनी स्वतःचा नाश करून घेत होती! अथेन्स विरूद्ध कॉरिन्थ,

कॉरिन्थ विरुद्ध थीब्स विरुद्ध स्पार्टा व स्पार्टी विरुद्ध अथेन्स असा चक्रव्यूह होता,परस्परद्वेष व परस्पर संशय यांचे हे असे कधी न संपणारे रहाटगाडगे,द्वेषमत्सराचे हे चक्र जणू गमतीने फिरत होते.विषारी,मारक असा हा खेळ खराच; पण त्यातच त्यांना जणू रस वाटत होता.

गोडी वाटत होती! बारीक- सारीक गोष्टीसाठीही ते एकदम युद्ध पुकारीत. युद्धही एक नित्याची,मामुली बाब बनली. उत्तमोत्तम माणसे रणांगणावर मरत होती.सारी ग्रीक संस्कृती विनाश पावणार असे दिसत होते. साऱ्या ग्रीक संस्कृतीवर गडप होण्याची वेळ आली होती.अथेन्समधील आयसॉक्रेटिससारख्या काही मुत्सद्दयांनी हा धोका ओळखला व आपल्या राष्ट्राचे प्राण वाचावेत,म्हणून ग्रीसचे एक संयुक्त संस्थान बनवावे असे त्यांनी सुचविले.

तो विचार उत्कृष्ट होता;परंतु तो प्रत्यक्षात यावा,ती योजना अंमलात यावी यासाठी ज्याची योजना करण्यात आली,तो माणूस योग्य नव्हता.चुकीच्या माणसाची निवड झाली.

मॅसिडोनियाचा राजा फिलिप्स याच्यावर हे संयुक्त संस्थान बनविण्याचे काम सोपविण्यात आले.मॅसिडोनिया म्हणजे ग्रीस देशाचा उत्तर भाग हा जरा रानटी होता.इतर भागांइतका सुसंस्कृत नव्हता.सर्व ग्रीकांचे एक संयुक्त राष्ट्र बनविण्यासाठी आयसॉक्रेटिसने दिलेले आमंत्रण त्याने स्वीकारले.फिलिप्सने मॅसिडोनियन लोकांची एक सेना उभारलेली होतीच;ती बरोबर घेऊन युद्धाने त्रस्त झालेल्या व कंटाळून गेलेल्या या द्वीपकल्पावर तो तुटून पडला व त्याने सारी स्वतंत्र ग्रीक शहरे जिंकून त्यांचे एक संयुक्त राष्ट्र बनविले.अशा रीतीने ग्रीक गुलामांचे हे संयुक्त राष्ट्र जन्माला आले.


राजा फिलिप हा अलेक्झांडरचा बाप.फिलिप सुशिक्षित;

पण जंगली मनुष्य होता.तो ग्रीक लोकांच्या ज्ञान-विज्ञानाचे कौतुक करी.त्याने त्यांच्या तत्त्वज्ञानाचा अभ्यास केला.त्यांची संपत्ती लुटण्याला तो अधीर झाला.तो सायरसच्या नमुन्याचा योद्धा होता.तो युद्ध पुकारावयाला भिणारा नव्हता.तो स्वतः सैन्याबरोबर असे. त्याची महत्त्वाकांक्षा अमर्याद होती.त्याला सारे जग खेळवावयाला हवे होते.इराणवर हल्ला करण्यासाठी त्याने आधी ग्रीस हातात घेतला.तो ग्रीसमधून पर्शियावर उडी मारणार होता. साम्राज्ये निर्मिण्याची अपूर्व बुद्धिमत्ता असणाऱ्यांमध्ये फिलिप हा 'साम्रज्यांचा संस्थापक' या नात्याने अद्वितीय होता. त्याच्या कुटुंबाव्यतिरिक्त बाहेर सर्वत्र त्याचा शब्द म्हणजे कायदा होता.एपिरसच्या राजाची मुलगी ऑलिम्पियस ही त्याची पत्नी. तिच्याच पोटी अलेक्झांडर जन्मला.ती धर्मवेडी होती.ती आपल्या नवऱ्याचा फार तिरस्कार करी व त्याचे जीवन करता येईल तितके दुःखी करणे,हा आपला धर्म मानी.तो चिडावा,

संतापावा,म्हणून ती म्हणे,"अलेक्झांडर माझ्या पोटचा असला तरी तो तुमचा नाही!तो एक देव पुत्र देवोद्भव आहे." या दंतकथेवर फिलिपचा विश्वास होता की नाही कोण जाणे,परंतु अलेक्झांडरचा मात्र मरेपर्यंत संपूर्ण नसला,तरी अर्धवट विश्वास होता. अलेक्झांडर अनेकदा आग्रहाने सांगे, "मी दैवी आहे- देवापासून जन्मलो आहे."


मॅसिडोनियाच्या राजाच्या राजवाड्यातील जीवनात सदोदित काही ना काही धर्मविधी चाललेले असावयाचेच;

त्यांत भांडणे, मारामाऱ्या,द्वेषमत्सर यांचेही मिश्रण असे.आई अलेक्झांडरला फूस देई व तो बापाचा अपमान करी.राजवाड्यात एकदा एक मोठी मेजवनी चालली होती,पिता व पुत्र दोघेही दारू पिऊन बेहोश झाले होते.

अलेक्झांडरने फिलिपचा अपमान केला,बाप मुलाला भोसकण्यासाठी धावला.पण सुरा नीट खुपसण्याइतकी शुद्ध त्याला नसल्यामुळे तो तोल जाऊनजमिनीवर पडला.आणि भावी आयुष्यात व्यभिचार, बदफैलीपणा व दिग्विजय करण्यास अलेक्झांडर वाचला.अशा वातावरणात अलेक्झांडर वाढला. पित्याने त्याला ग्रीक शिक्षण चांगले मिळावे म्हणून खटपट केली.त्याने मुलासाठी अती उत्कृष्ट व नामांकित शिक्षक जमविले.

कवी, तत्त्वज्ञानी,संगीतज्ज्ञ,वैय्याकरणी,अलंकार शास्त्रज्ञ,सारे राजवाड्यात येऊन अलेक्झांडरला सुसंस्कृत करू लागले,त्याला माणसाळवू लागले.कारण तो जरा रानवट होता.त्याला थोडी तरी माणुसकी यावी म्हणून हे सारे आचार्य खटपट करू लागले.या नामांकित शिक्षकांत जगप्रसिद्ध ॲरिस्टॉटल हा होता.ॲरिस्टॉटल म्हणजे विद्वत्तेचे व ज्ञानाचे आश्चर्यकारक भांडार ! एका लहानशा डोक्यात इतक्या विद्या मावत तरी कशा? शंभर माणसांचे ज्ञान त्याच्या एकट्याच्या डोक्यात होते.तो सर्व विषयांवर सारख्याच अधिकाराने लिहू व बोलू शके राजकारण,

नाटक,काव्य,सृष्टिज्ञान,वैद्यक,मानसशास्त्र,इतिहास,तर्क,ज्योतिर्विद्या,नीतिशास्त्र,गणित,अलंकार

शास्त्र,प्राणिशास्त्र थोडक्यात बोलावयाचे तर सर्व ज्ञाने व विज्ञाने त्याच्यासमोर हात जोडून उभी राहत.तरीही त्याला अलेक्झांडरवर फारसा परिणाम करता आला नाही.


इतकेच काय;पण राजघरण्यातील कोणावरच त्याचा फारसा प्रभाव पडला नाही.फिलिप, अलेक्झांडर,

ऑलिम्पिस,ही तीनही माणसे 'ग्रीक संस्कृतीची पूजक' म्हणून मिरवीत;परंतु ते नुसते सोंग होते.ग्रीक संस्कृतीच्या झिरझिरीत बुरख्याखाली त्यांचा रानवटपणा लपलेला होता. ही तीनही माणसे अंतरंगी रानमांजरासारखीच दुष्ट व हलकट होती.फिलिप पर्शियावर स्वारी करावयास निघणार,तोच त्याचा खून झाला. त्याच्या पत्नीच्याच चिथावणीमुळे तो खून झाला असे म्हणतात.मृत सम्राटाला जो मान दिला गेला होता,तोच मारेकऱ्यांच्याही प्रेतास मिळावा, तितक्याच थाटाने व समारंभाने मारेकऱ्याचाही देह पुरला जावा,असा हट्ट तिने धरला होता.


फिलिप मेला,तेव्हा अलेक्झांडर वीस वर्षांचा होता.

कसलेल्या व शिस्तशीर सैन्याचा तो मालक होता.

पूर्वेकडील देशांवर तुटून पडावयाला सारी सिद्धता होती.सैनिक अपूर्व अशा सेनानीची जणू वाटच पाहत होते.ज्याला कल्पनाशक्ती व प्रतिभा आहे,अहंकारआहे,

साहसी वृत्ती आहे.परिणामांचा विचारही न करता जो बेछूटपणे पुढे जाईल.सर्व जगावर स्वामित्व मिळविण्याचे कार्य हाती घेण्याइतपत ज्याच्याजवळ हिंमत व कौशल्य आहे,असा सेनापती सैन्याला हवा होता. अशा सेनापतीच्या नेतृत्वाखाली वाटेल तिथे जावयाला ते तयार होते.हे सारे गुण तर अलेक्झांडरच्या ठायी होतेच,पण यांशिवाय आणखीही पुष्कळ होते.आपल्या कर्तृत्वाविषयी अद्यापि कोणाला काही शंका असेल,तर ती दूर करण्यासाठी तो एकदम उभा राहिला. मॅसिडोनियाच्या उत्तरेकडील जाती-जमातींना त्याने शरण यावयास लावले आणि नंतर मॅसिडोनियाचे जू झुगारून देऊन पुन्हा स्वंतत्र होऊ पाहणाऱ्या इतर ग्रीक शहरांवर तो विजेसारखा चालून गेला.फिलिपच्या मरणाची वार्ता ऐकून ही शहरे बंड करून उठली होती. अलेक्झांडरने थीब्स शहराला वेढा घातला व फारशी अडचण न पडता ते जिंकून घेतले. आपल्या रक्ताळ मुठीचा इतरही सर्व ग्रीक लोकांना कायमचा धाक बसावा म्हणून त्याने थीब्स शहराचा संपूर्ण विध्वंस केला,शहरातील सहा हजार लोकांस ठार मारले व तीस हजार लोकांना गुलामकरून बाजारात विकले. 


नंतर तो दक्षिणेकडच्या ग्रीक राज्यांकडे वळला. जिथे जिथे तो जाई,तिथे तिथे त्याच्याभोवती खुशामत्ये गोळा होत,त्याची खोटी स्तुती करीत, कोणी त्याला भेटी देत.

बंडखोर ग्रीकांना प्रायश्चित्त मिळालेच होते,त्यामुळे नीट धडा शिकून त्यांनी अलेक्झांडर हाच आपला पुढारी अशी घोषणा केली व ते त्याच्या पूर्वेकडील विस्तृत प्रदेशावरच्या स्वारीत सामील झाले.अलेक्झांडरने ग्रीस देशात सर्वत्र विजय संचार केला.त्याला कोणीही कोठेच विरोध केला नाही असे नाही.तलवारीने विरोध करणारे जरी त्याला फारसे भेटले नाहीत,तरी निराळ्याच रीतींनी त्याला गप्प बसविण्याचे प्रकार काही ठिकाणी झाले,

अलेक्झांडरविषयी आपणास खरोखर काय वाटते हे त्याच्या तोंडावरसांगण्याइतपत धैर्य व स्वातंत्र्य असलेले काही लोक अद्यापि होते.अलेक्झांडर जेव्हा कॉरिन्थ येथे आला,तेव्हा वीराला शोभेसे त्याचे स्वागत झाले.हजारोंनी जयघोष केले.पण तिथे जमा झालेल्या स्तुतिपाठकांत त्याला डायोजिनीस दिसेना. 


डायोजिनीस हा या जगात कशातही काही अर्थ नाही.सारे पोकळ व भोंगळ,दिखाऊ व व्यर्थ आहे असे मानणारा 'सिनिक' होता.कॉरिथ मधल्या एकाच माणसाला अलेक्झांडर किंमत देई,तो म्हणजे डायोजिनीस.त्यानेही आपली स्तुती करावयास यावे असे अलेक्झांडरला वाटत होते;पण तो वृद्ध पाखंडी आला नाही. कॉरिन्थजवळच्या एका खेड्यात तो शांतपणे व निश्चितपणे बसला होता.

जेत्यांचा गर्व व सम्राटांचा दिमाख दोहोंविषयी तो बेपर्वा होता, त्याला त्याचे काडीइतकेही महत्त्व वाटत नव्हते, तो मॅसिडोनियन सैन्याची ती प्रचंड व विजयी मिरवणूक पाहावयाला आला नाही की विजयी राजाचे दर्शन घडावे म्हणून त्याने धडपडही केली नाही.डायोजिनिस आपणाकडे येत नाही असे पाहून अलेक्झांडरनेच त्याच्याकडे जावयाचे ठरविले.डायोजिनीस एकटाच सूर्यप्रकाशात ऊन खात बसला होता.तिथे जाऊन मैत्रीची व उदारपणाची बतावणी करीत त्याने विचारले, 'मी तुम्हाला काय देऊ? तुमच्यासाठी मी करण्यासारखे काही आहे काय?" 'होय' तो वृद्ध व बेरकी डायोजिनीस म्हणाला,"एक गोष्ट तुम्ही खास करू शकाल; सूर्यप्रकाशाच्या व माझ्या दरम्यान तुम्ही उभे आहात,तेवढे दूर व्हाल तर बरे."


त्या म्हाताऱ्याच्या या उद्धटपणाबद्दल त्याला शासन न करता विचार चिंतन करण्यासाठी त्याला तिथेच सोडून अलेक्झांडर निघून गेला! ॲरिस्टॉटलचा शिष्य तो उगीच नव्हता झाला.तो आपल्या एका खुशामत्यास म्हणाला,"मी जर अलेक्झांडर नसतो तर डायोजिनीस होणे मी पसंत केले असते." या म्हणण्यावर उत्तर द्यावेसे डायोजिनीस याला वाटलेच असते,तर तो म्हणाला असता,"मी जर डायोजिनीस नसतो तर अलेक्झांडरखेरीज दुसरा कोणीही व्हावयाला मी तयार झालो असतो."


अलेक्झांडर अती महत्त्वाकांक्षी होता.त्याच्या महत्त्वाकांक्षेने त्याच्या डोक्यातील सारे तत्त्वज्ञान पिटाळून लावले होते,इतर सारे विचारही पार हाकलून दिले होते.तो मागेपुढे पाहणारा नव्हता, तो बेछूट व बेदरकार असा केवळ सैतान होता! जेथे पाऊल टाकण्यासही इतरांस भय वाटे.तिथे तो खुशाल उडी घेई व निःशंकपणे घुसे,जे सर्वस्वी अशक्य वाटे,त्याबाबतही तो जुगार खेळे व बहुतकरून विजयी होई.एखादी दुस्तर नदीही अलेक्झांडर सहज तरून जाई.एखाद्या दुर्लघ्य डोंगरावरून शत्रूला हुसकावयाचे असेल तर तो ती टेकडी चढून जाई व शत्रूला पळावयाला लावी.देव नेहमी त्याच्या बाजूने लढतात,अशी लोकांची समजूत झाली होती.


तो सरळ,साधाभोळा प्लुटार्क लिहितो, "पॅपिलियन किनाऱ्याजवळील समुद्राच्या लाटा तेथील खडकाळ टेकड्यांच्या अगदी पायथ्यापर्यंत येतात.पण अलेक्झांडरला नीट जाता यावे म्हणून या लाटाही मागे हटल्या व त्यांनी त्याला रस्ता दिला." 


जेव्हा त्याने फोनिशियनांच्या टायर शहराला वेढा घातला.

तेव्हा तेथील लोकांनी शहरांतील अपोलो देवाचा पुतळा दोरखंडांनी जाम बांधून टाकला व 'आता कसा अपोलो अलेक्झांडरच्या बाजूला जातो,पाहू या' असे ते स्वतःशी म्हणाले.त्या देवाने आपणास सोडून अलेक्झांडरकडे जाऊ नये.म्हणून त्यांनी त्याला खिळे मारून जागच्याजागी खिळवून टाकले.पण प्लुटार्क सांगतो,

"टायरमधील जनतेचे ते सारे प्रयत्न झुगारून देऊन अपोलो अखेर अलेक्झांडरकडे गेला तो गेलाच.त्याचे शरीर दोरखंडांनी व खिळ्यांनी जखडून टाकण्यात आले असले तरी मन मोकळेच होते;त्यामुळे अपोलोचा आत्मा अलेक्झांडरच्या वतीनेच लढला."


अलेक्झांडर आश्चर्यकारक वेगाने आशियातील देश एकामागून एक घेत चालला.त्याला हे असंभाव्य विजय सारखे मिळत गेल्यामुळे त्याचे शत्रूही एक प्रकारच्या भोळसट आदराने त्याच्याकडे पाहू लागले.हा कोणी देवच आकाशातून पृथ्वीवर अवतरला आहे असे त्यांस वाटू लागले.अलेक्झांडर एकाच वेळी अनेक ठिकाणी असतो अशा कथा पसरू लागल्या. त्याच्याविरुद्ध शत्रूनी उभरलेल्या प्रचंड फौजा न लढता आपोआप मोडल्या.

शत्रूचे सैनिक लढनासेच झाले.त्या प्रचंड सेनांचा पराजय अलेक्झांडरने नाही केला,तर अलेक्झांडरविषयी त्यांना वाटणाऱ्या भीतीने केला..


अलेक्झांडर वेडा होता खराच,पण तो तेजस्वी वेडा होता.त्याचे वेडेपण क्षुद्र नव्हते;त्यातही एक प्रकारची ऐट होती.आपण देव आहोत असे त्यालाही वेडाच्या लहरीत वाटे.देव समजून आपली पूजाअर्चा लोकांनी करावी,असा आग्रह तो धरी.एकदा त्याच्या मांडीवर प्रहार झाला. तेव्हा इतरांच्या रक्ताप्रमाणेच आपलेही रक्त आहे असे पाहून त्याला विस्मय वाटला,कारण अमर अशा देवांच्या नसांतून जे दिव्य रक्त वाहते,तेच आपल्याही नसांत आहे अशी त्याची समजूत होती.लढाईच्या वेळी तो आकाशातील देवतांना आपल्या साहाय्यास बोलावी;तो त्यांना उद्देशून म्हणे,"मी तुमचा भाईबंद आहे,मी मर्त्य नाही,हे विसरू नका."त्याचे उत्कट व निष्ठावंत भक्तही त्याचा हा अहंकारी पागलपणा पाहून कधी कधी थक्क होऊन जात ! स्वतःच्या क्षुद्र अहंकाराच्या आरशात तो आपले रूप पाही.जगातल्या साऱ्या क्षुद्र व दुबळ्या लोकांमध्ये आपण ज्यूपिटर प्रमाणे शोभत आहोत असे त्याला वाटे.ज्यूपिटर म्हणजे ग्रीकांचा युद्धदेव,जणू, ग्रीकांचा देवेन्द्रच! अधिक पुढे जावयाचे नाही असे ठरविल्यावर 


हिंदुस्थानातून जेव्हा तो परत फिरला,तेव्हा त्याने आपल्या घोड्यांचे लगाम,चिलखताचे तुकडे व शिरस्त्रांणांचे भाग मुद्दाम मागे ठेवले.या साऱ्या वस्तू हेतुपुरस्सरच आकाराने प्रचंड अशा बनविण्यास आल्या होत्या.त्या पाहून मॅसिडोनियन सैन्यांतील लोक व घोडे प्रचंड आकाराचे,अजस्र होते,असे हिंदुना वाटावे,असा हे अवशेष ठेवण्यात त्याचा हेतू होता.त्याला स्वतःचे सर्व काही पवित्र वाटे.


आशियातील एका नव्या शहराला त्याने आपल्या

घोड्याचे व दुसऱ्याला आपल्या कुत्र्याचे नाव दिले! त्याची ही आत्मप्रदर्शनाची बारात,त्याची ही जाहिरातबाजी तिरस्करणीय व किळसवाणी वाटते.जेव्हा त्याची विजयी सेना कार्यानियांतून जात होती,तेव्हा त्याने एका प्रचंड व्यासपीठावर मेजवानी मांडली होती! ते व्यासपीठ आठ घोडे ओढीत होते व त्यावर खान-पान चालले होते! त्या चालत्या व्यासपीठावर तो आपल्या खुशमस्कऱ्यांसह खात-पीत बसला होता. शहरामधून मूर्खाची ती मिरवणूक गेली,तेव्हा मॅसिडोनियन मेजवानीमधील पोकळ ऐट व क्षुद्र अवडंबर पाहून पौर्वात्य दिङ्मूढ झाले! हा मूर्खपणा की पराक्रम,हे त्यांना समजेना.

त्याची वृत्ती इंग्लंडमधील हवेप्रमाणे चंचल होती. त्याचा स्वभाव क्षणाक्षणास पालटे.एका क्षणात तो सौम्यपणा सोडून सैतानीपणा स्वीकारी! एकदा त्याच्या सेना वाळवंटातून जात असता एका शिपायाने आणून दिलेले पेय त्याने नाकारले;कारण,सेनापतीनेही सर्वसामान्य शिपायांबरोबर तहान सोसली पाहिजे,त्यांचे जीव तहानलेले व्याकूळ होत असता आपण पेय पिणे योग्य नव्हे,असे त्याला वाटले.पण पेय देणाऱ्या एका नोकराकडून त्याचा चुकून अपमान झाला. त्याबरोबर त्याने दोन्ही हातांनी त्याचे केस धरून त्याचे डोके जोराने भिंतीवर आपटले!त्याचे डोके ठिकाणावर असे,तेव्हा तो होमर वाची,नशेच्या भरात त्याने आपला प्रियतम मित्र क्लायटस याला ठार मारले,पण शुद्धीवर आल्यानंतर त्याला झालेला पश्चात्ताप त्याच्या दारूच्या धुंदीतील खुनशीपणाइतकाच तीव्र होता. स्तुती करणाऱ्यांना तो लुटीतील भाग देई.पण 


कॅलिस्थेनिस नामक एक तत्त्वज्ञानी त्याची देव म्हणून पूजा करीना,म्हणून त्याने त्याला फाशी दिले! त्याचा सर्वांत मोठा डरायस नामक शत्रू मेला तेव्हा तो रडला.पण रोजची करमणूक म्हणून तो हजारो युद्धकैद्यांची कत्तल करी!


तो स्वतःच्या प्राणांविषयी जसा बेफिकीर होता, तसाच इतरांच्याही प्राणांविषयी बेपर्वा होता. त्याचा,

एक आवडता शिपाई आजारी पडला व वैद्यांच्या सल्ल्याप्रमाणे न वागल्यामुळे मेला.पण अलेक्झांडरने 'या वैद्याने माझा शिपाई मारला' असे म्हणून त्या वैद्याला क्रॉसवर चढविले! तरीही त्याचे मित्रवियोगाचे दुःख कमी होईना, तेव्हा त्याचा विसर पडावा म्हणून तो अकस्मात् एका शहरावर चालून गेला व त्याने तेथील सर्व नागरिकांची कत्तल करून त्याने त्यांचा आपल्या मृत मित्राला बळी दिला. 


शत्रूकडील सेनापती त्याच्या हाती पडत,तेव्हा त्यांना कधीकधी तो अत्यंत उदारपणे वागवी,तर कधी कधी जवळच्या झाडावर फाशी देई. अलेक्झांडरची स्वारी कशी वागेल हे त्या त्या प्रसंगी त्याची जी लहर असेल,तीवर अवलंबून असे.एखाद्याला ठार करावे असे त्याच्या मनाने घेतले,की तो स्वतःच आरोप करणारा,न्याय देणारा व न्यायाची अंमलबजावणी करणारा म्हणजे ठार मारणारा बने.शत्रूना छळण्यासाठी नवनव्या क्लृप्त्या शोधून काढण्यातही त्याचे डोके कमी चालत असे नाही.प्लुटार्क म्हणतो, एकदा दोन झाडे वाकवून त्यांच्यामध्ये त्याने एका कैद्याला बांधविले व मग मुद्दाम वाकवून भिडविलेली ती झाडे एकदम सोडून देण्याचा हुकूम केला.तसे करताच ती झाडे इतक्या वेगाने आपल्या मूळ स्थितीतच गेली की,त्या दुर्दैवी कैद्याचे उभे दोन तुकडे झाले व प्रत्येक झाडाने त्याचे अर्धे अर्धे रक्तबंबाळ शरीर उचलून वर नेले व जणू विजयाची ढाल म्हणून मिरवले! त्या कैद्याचा अशा राक्षशी छळवणुकीने वध केल्यावर अलेक्झांडर होमर वाचीत पडला! त्याच्या बहुमूल्य वस्तूंत होमरच्या काव्यांची एक सुंदर प्रत सदैव असे.इलियडमधील युद्धप्रसंग वाचणे आपणास फार आवडते असे तो म्हणे, इलियडमधील समर-वर्णने वाचूनच तो युद्धप्रिय बनला.विजयध्वजा सर्वत्र मिरवावी,अजिंक्य म्हणून सर्वत्र गाजावे असे त्याला त्यामुळेच वाटू लागले होते.होमरच्या काव्यांनीच त्याला समर स्फूर्ती दिली होती.तो लढत नसे किंवा होमरही वाचीत नसे,तेव्हा तो दारू पिऊन पडत असे. रणांगणांवरील पराक्रम असोत किंवा दुसरी दुष्कृत्ये अथवा व्यसने असोत,तो सर्वच बाबतीत इतरांवर ताण करी.जेथे जाऊ तिथे आपण बिनजोड असलो पाहिजे असेच जणू तो म्हणे! सामान्य लोकांइतपत अतिरेक त्यास पसंत पडत नसे.त्याचा अतिरेक अमर्याद,अतुल असे.तो पिऊ लागला,की पिंपेच्या पिंपे रिकामी करी आणि मग दारूच्या धुंदीत एखाद्या मत्त देवाप्रमाणे वाटेल ते करीत सुटे.एकदा तो एक मेजवानी देत असता एका वेश्येचा सन्मान करीत होता; नशा केलेली ती रमणी त्याला म्हणाली,"इराणी राजाच्या राजवाड्याला आग लावा.

आणि त्याने आग लावली! एकदा तर त्याने एक फारच मोठी गंमत केली.दारू पिण्याची मॅरेथॉन शर्यत लावून सर्वांत जास्त दारू पिणारास त्याने सोन्याचा मुकुट बक्षीस म्हणून ठेवला ! ज्याने तो सुवर्णमुकुट मिळविला तो तीन गॅलन दारू प्याला होता! पण त्या नशेतच तो मेला.दुसरे एकेचाळीस जणही त्या स्पर्धेत भाग घेऊन मरण पावले." एकदा नाचरंग,मेजवानी असा स्वैराचार रात्रंदिवस सारखा चालल्यामुळे तो तापाने आजारी पडला व थोड्याच दिवसांनी ख्रि.पू. ३२३ या वर्षी तो मरण पावला.

मरणसमयी तो केवळ तेहतीस वर्षांचा होता; पण एवढ्या लहान वयात इतके देश उद्ध्वस्त करणारा,मानवांवर इतके अन्याय करणारा,त्यांच्यावर दुःखाच्या इतक्या प्रचंड राशी ओतणारा,त्यांच्या अशी कत्तली करणारा प्राचीन इतिहासात दुसरा कोणी आढळेलसे वाटत नाही.

अलेक्झांडरचे अवास्तव स्तोम माजविणाऱ्या इतिहाकारांनी त्याच्याभोवती एक तेजोवलय निर्माण करून ठेवले आहे.जे जे उच्च आहे,थोर आहे,सद्गुणी आहे, त्या सर्वांची आदर्शभूत मूर्ती म्हणजे अलेक्झांडर असे त्यांनी लिहून ठेवले आहे.नवनवी पुरे-पट्टणे वसविणारा,रानटी जातींना माणसाळविणारा,राष्ट्राराष्ट्रांत व्यापार बाढविणारा रस्ते बांधून दळणवळण वाढविणारा,इत्यादी प्रकारे त्याचे वर्णन करण्यात येत असते.परंतु अशा या दुष्ट-शिरोमणीला,या हडेलहप्पी सैतानाला,अशा रीतीने दिव्य संतपण दिलेले पाहून शिसारी येते! संस्कृती,सुधारणा यांचा थोडाही विचार या घमेंडखोराच्या डोक्यात येत नसे.अलेक्झांडर फक्त अलेक्झांडरलाच पूजी. अलेक्झांडरचीच पूजा,

अलेक्झांडरचीच स्तुती! त्याने शहरे बांधली तशीच धुळीसही मिळविली ! ती उभारणी वा संहारणा त्याच्या स्वत:च्या वैभवासाठी होती.मानवजातीचा विचारही त्याच्या डोक्यात शिरत नसे.जी थोडीफार शहरे त्याने वसविली,त्यांबद्दल त्याचे पोवाडे गाण्यात येतात; पण त्याने शेकडो शहरांची राखरांगोळी केली त्याचे काय? अलेक्झांडरच्या युद्धामुळे ग्रीक संस्कृतीची बीजे आशियाभर पेरली गेली असे मानणे हा केवळ मूर्खपणा होय.वस्तुतः त्याने संस्कृतीची बीजे पेरली नसून सूडाची, द्वेष-मत्सरांची व भावी युद्धांची मात्र बीजे सर्वत्र पेरली.


युरोपची संस्कृती पूर्वेकडे पसरली ती खरोखर अलेक्झांडरच्या तलवारीमुळे नव्हे,तर सोलोन,

हिराडोटस,प्लेटो यांसारख्या ग्रीक कवींनी व तत्त्वज्ञान्यांनी केलेल्या कामगिरीमुळे. जग सुधारावे,ते अधिक उदार व सुसंस्कृत करावे, त्याची अधिक चांगली सहकारी संघटना करावी,अशी भव्य ध्येये अलेक्झांडरच्या डोळ्यांसमोर कधीही नाचली नाहीत! अशा ध्येयांनी त्याचे अहंकारी मन कधी उच्च बनलेच नाही.आपल्या बुसिफालस नामक घोड्याला त्याने जसे फटके मारून वठणीवर आणले, त्याच्यावर स्वार होता यावे म्हणून त्याला ज्याप्रमाणे माणसाळविले,त्याप्रमाणे मानवांवर आपणाला सत्ता गाजविता यावी म्हणून त्याने त्यांना तलवार दाखवून हीन-दीन केले.


२४.०८.२३ या भागातील पुढील भाग..



८/१२/२३

कुणालाच हुकूम चालवणं आवडत नाही. No one likes to be dictated to.

एकदा मला 'अमेरिकन बायोग्राफी' ची डीन मिस इडा टाखेल बरोबर जेवण करण्याची संधी मिळाली.मी त्यांना सांगितलं की मी हे पुस्तक लिहितेय.त्यानंतर आम्ही या अंतिम महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा करू लागलो की लोकांना कसं प्रभावित करावं.त्यांनी मला सांगितलं की जेव्हा ती ओवेन डी.यंगची जीवनगाथा लिहीत होती तेव्हा तिनं एका माणसाची मुलाखत घेतली जो तीन वर्षांपासून त्याच ऑफिसमध्ये बसत होता.ज्यात मिस्टर यंग बसत होते.या व्यक्तीचं म्हणणं होतं की या तीन वर्षांत त्याने ओवेन डी.यंगना कुणालाही आदेश देताना ऐकले नाही.ते नेहमी सल्ला देत,आदेश नाही.ओवेन डी.यंग कधीच असं म्हणत नसत,"असं करा वा तसं करा," वा " हे करू नका ते करू नका." त्याऐवजी ते म्हणत,"तुम्ही यावर विचार करू शकता." किंवा "हे काम करावं असं तुम्हाला वाटतं का ?" बरेचदा ते पत्र डिक्टेट केल्यावर आपल्या कर्मचाऱ्याला विचारत असत,"तुम्हाला हे कसं वाटतंय?"आपल्या हाताखालच्या कर्मचाऱ्याद्वारे लिहिलं गेलेलं पत्र वाचल्यावर ते म्हणत,"कदाचित हे वाक्य असं लिहिणं जास्त चांगलं राहील." ते लोकांना स्वतः आपली चूक सुधारण्याची संधी देत असत.त्यांनी कधी आपल्या हाताखालच्या लोकांना काम करण्याची आज्ञा दिली नाही.त्यांनी लोकांना काम करण्याची आज्ञा दिली नाही.ते लोकांना आपलं काम करू देत,


जेणेकरून ते आपल्या चुकांपासून स्वतःच शिकत.या त-हेच्या तंत्राने समोरच्याला आपली चूक सुधारणे सोपे जाते.त्यामुळे त्याच्या सन्मानाला ठेच पोहोचत नाही आणि त्याच्यात आपण महत्त्वपूर्ण आहोत ही भावना जागृत होते. त्यामुळे विद्रोहाची नव्हे तर सहयोगाची भावना प्रबळ होते.


कडक आदेश दिल्याने जी आक्रोशाची भावना निर्माण होते ती बराच दीर्घ काळपर्यंत कायम राहते,मग भलेही तो आदेश स्पष्टपणे चूक दुरूस्त करण्यासाठी दिला गेला असेल.


डॅन सँटारॅली व्यामिंग,पेनसिल्वानियाच्या एका व्होकेशनल स्कूलमध्ये शिक्षक होते.त्यांनी आमच्या वर्गात सांगितलं की त्यांच्या एका विद्यार्थ्याने एकदा शाळेच्या बाहेर चुकीच्या जागी कार पार्क केली,ज्यामुळे रहदारीत अडचण येत होती.दुसरा एक शिक्षक वर्गात आला आणि त्याला रागावत त्याने विचारलं,"कुणाची कार रस्त्यात उभी आहे ?" जेव्हा कारवाला मुलगा उभा राहिला,तेव्हा त्या शिक्षकानं ओरडून म्हटलं, "त्या कारला तिथून तत्काळ हटव,नाहीतर मी तिच्या चारी बाजूंना साखळी बांधून बाहेर फेकून देईन." चूक त्या विद्यार्थ्याचीच होती.त्याला तिथे कार उभी करायलाच नको होती.परंतु त्या दिवसापासून केवळ तो विद्यार्थीच नव्हे तर त्या वर्गातली सगळी मुलं त्या शिक्षकाचा द्वेष करू लागली.या घटनेनंतर त्यांनी आपल्याकडून पूर्णपणे त्या शिक्षकास बेजार करण्याचे आणि त्याला त्रास देण्याचे प्रयत्न केले.

या गोष्टीला दुसऱ्या पद्धतीने सांगता आले असते.तो शिक्षक मैत्रीपूर्ण स्वरात विचारू शकला असता,"रस्त्यात उभी केलेली कार कुणाची आहे?" आणि त्यानंतर ही सूचना देऊ शकला असता की जर ती कार तिथून हटवली तर इतर कार्सना येण्याजाण्यास सुविधा होईल.हे ऐकून तो विद्यार्थी आनंदाने कार हटवायला तयार झाला असता आणि तो व त्याचे सहपाठी त्या शिक्षकावर अजिबात चिडले नसते.


प्रश्न विचारल्यावर केवळ आदेशच आनंददायक होत नाही तर समोरच्याची रचनात्मकता पण प्रेरित होते.जर लोकांना असं वाटलं की तो निर्णय घेण्यात त्यांचा सहभाग आहे,तर ते अधिक चांगल्या तऱ्हेने ते काम करतील.


इयान हे आफ्रिकेतल्या मॅकडोनॉल्ड मशीनचे पार्ट बनवायच्या कारखान्यात जनरल मॅनेजर होते.त्यांना एक मोठी ऑर्डर मिळणार होती.अट ही होती की त्यांना खूपच कमी वेळात माल पुरवायचा होता.त्यांना हे माहीत होतं की ते इतक्या कमी वेळात मालाचा पुरवठा करू शकणार नाहीत.कारखान्यात आधीच्या ऑर्डर्सचा माल तयार होत होता आणि या मोठ्या ऑर्डरची समयसीमा इतकी कमी होती की हे काम अशक्य वाटत होतं.इयानने मजूरांना कामाची गती वाढवा आणि उत्पादन करा असं सांगितलं नाही.त्याऐवजी त्याने सर्वांना एकत्रित केले आणि पूर्ण परिस्थिती विशद केली.त्याने सांगितले की जर ही ऑर्डर त्यांना मिळाली तर त्यांच्या कंपनीला खूप लाभ होईल आणि जर ती वेळेवर दिली गेली तर मजूरांनासुद्धा त्यामुळे लाभ होईल.मग त्याने प्रश्न विचारायला सुरुवात केली.


"आम्ही असं काही करू शकतो का की आम्हाला ही ऑर्डर मिळेल?""कुणाच्या डोक्यात असा काही उपाय आहे का,ज्यामुळे ही ऑर्डर घेणे आणि वेळेवर पूर्ण करणे शक्य होईल?" "असा काही उपाय आहे का ज्यामुळे आम्ही आमच्या कामाच्या वेळात बदल करून जी समयसीमा दिलीय,ती पूर्ण करू?" 


कर्मचाऱ्यांनी अनेक उपाय सुचवले आणि त्यांनी ती ऑर्डर घ्यायलाच हवी असे आग्रहाने म्हटले. त्यांनी 'आम्ही हे करू शकतो.' या भावनेने काम केलं,त्यामुळे त्यांना ऑर्डर तर मिळलीच,पण मालाचे उत्पादन आणि पुरवठा अगदी वेळेवर झाला.


केवळ थेट आदेश देण्याऐवजी प्रश्न विचारा.

३०.११.२३ या लेख मालेतील पुढील भाग..


आदरणीय डॉ.रवींद्र श्रावस्ती यांच्याकडून घेण्यात आलेली ही वाचनासंदर्भातील चिंतनशील अशी नोंद


१९५३ मध्ये चार्ली मंगर २९ वर्षांचे होते.त्यांचा नुकताच घटस्फोट झाला होता.राहायला घर नव्हते.तत्कालीन काळात अमेरिकेत घटस्फोट हा मोठा सामाजिक कलंक मानला जात असे..घटस्फोटानंतर अचानक लगेच त्यांचा वर्षांचा मुलगा टेडी याला कॅन्सर झाल्याचे निदान झाले.

त्यांच्या मुलाचा कॅन्सर असाध्य होता.त्यांच्याजवळ वैद्यकीय विमा नव्हता.


मुलाच्या कॅन्सर उपचारासाठी चार्ली मंगर यांचे सगळे पैसे संपले.ते कर्जबाजारी झाले.चार्ली रोज टेडीला हॉस्पिटलमध्ये भेटायचे -- आणि मग बाहेर येऊन रडत रस्त्यावर फिरायचे.टेडीचे वयाच्या ९ व्या वर्षी निधन झाले.चार्ली आतून तुटले,घटस्फोट आणि नंतर लगेच पोटच्या गोळ्याला गमावले.राहते घर गेले,

संसार तुटला, कर्जबाजारी झाले.अशा परिस्थितीत  ९९.९९% लोक दारू,ड्रग्ज किंवा आत्महत्येकडे वळले असते. चार्ली मंगेर यांनी असे काहीच केले नाही.त्यांना वाचनाची भारी आवड होती.सतत पुस्तकं वाचण्याची सवय असल्यामुळे त्यांना कदाचित पुस्तकांमधून या वाईट काळाला तरुन जाण्याचे धैर्य मिळाले असावे.


वयाच्या ५२ व्या वर्षी डोळ्यांच्या अयशस्वी शस्त्रक्रियेमुळे त्यांच्या एका डोळ्याला अंधत्व आले.हे अंधत्व इतके गंभीर होते की,त्यांची एक दिवस दोन्हीं डोळ्यांनी पूर्णतः अंध होण्याची शक्यता होती.


अशा सगळ्या घडामोडी चालू असतांना चार्ली मंगर यांचे वाचन वेड अधिक जोमाने वाढले होते.ते सतत नवनवीन गोष्टी शिकत असत त्यासाठी ते सतत नवनवीन पुस्तक वाचून काढीत.आपल्याला पूर्ण अंधत्व येऊ शकते त्यामुळे नंतर पुस्तकं वाचता येणार नाहीत या शक्यतेचा सामना करण्यासाठी  त्यांनी ब्रेल लिपी शिकून घ्यायला सुरुवात केली होती.


पण तरीही त्यांचा दुसरा डोळा शाबूत राहिला. मरणाच्या दिवसापर्यंत ते दररोज (एकाच डोळ्याने) १५ तासाहून अधिक वेळ वाचन करत असत. 


 बर्कशायर हॅथवेचे व्हाईस चेअरमन म्हणून त्यांचे काम हे मुख्यत्वे खूप वाचन करणे आणि चिंतन करणे हेच होते.

त्यामुळे त्यांची निर्णयक्षमता बेतोड होती.आणि त्यांच्या निर्णयांना वॉरेन बुफे सुद्धा च्यँलेंज करत नसत. 


पुस्तकांविषयी बोलतांना चार्ली मंगर म्हणत:


"माझ्या संपूर्ण आयुष्यात,मी असे कोणतेही ज्ञानी लोक पहिले नाहीत जे खूप वाचन करत नाहीत - एकही नाही,शून्य.वॉरन किती वाचतो - मी किती वाचतो हे पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल.आमच्या आजूबाजूच्या लोकांना वाटते की मी आम्ही दोन पाय आणि दोन हात चिकटलेले पुस्तकं आहोत." 


चार्ली मंगर ९९ वर्षे जगले.वैयक्तिक आयुष्यातील संकटांना,आरोग्याच्या प्रश्नांना हसत हसत सामोरे गेले.

त्यांच्या बोलण्यात, वागण्यात एखाद्या अध्यात्मिक दृष्ट्या प्रगल्भ माणसाची उंची होती.ते नेहमी आनंदी असत. आपल्या ज्ञानाचा,वाचनाचा वापर फक्त अर्थार्जनासाठीच नाही तर एक परिपूर्ण आयुष्य जगण्यासाठी त्यांनी केला.

वॉरेन बफे हे चार्ली मंगर यांना आपल्यापेक्षा अधिक स्मार्ट आणि इंटेलिजन्ट समजत.वॉरेन बफे यांच्या बरोबर मंगर यांनी बरेच दिवस काम केले आणि गुंतवणूक विश्वावर आपला ठसा उमटवला.


स्वतः वर इतके संकटं येऊनही ते पुन्हा कसे उभे राहू शकले असे विचारल्यावर ते म्हणाले होते, "सेल्फ पिटी म्हणजे स्व-सहानुभूती म्हणजे आपल्या संकटकाळात जगाची किंवा स्वतःची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न ही मोठी विनाशकारी प्रवृत्ती असते"


त्यांच्या भाषेत: - "सामान्यपणे,मत्सर,राग,सूड आणि स्व-सहानुभूती या विचारांच्या विनाशकारी पद्धती आहेत.

स्व-सहानुभूती (सेल्फ पिटी) हा तर वेडेपणा आहे.प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही स्व-सहानुभूतीच्या वेडेपणात वाहून जातांना बघाल,तेव्हा त्याचे कारण काय आहे याची मला पर्वा नाही,तुमचे मूल कर्करोगाने मरत आहे, तुमचे सगळे जग तुमच्याभोवती ढासळत आहे. या वेळी स्व-सहानुभूती किंवा जगाची सहानुभूती शोधून तुमची परिस्थिती सुधारणार नाहीये. संकटांना सामोरे जाण्याचा हा एक हास्यास्पद मार्ग आहे.तुमच्या जीवनात तुमच्यावर भयंकर वार होतील,नियती तुमच्यावर भयानक रीतीने अन्याय करेल तरीसुद्धा काहीही झाले तरी स्व सहानुभूतीने काहीच फरक पडत नाही. 


संकटकाळात काही लोक आणखी भरारी घेऊन उठतात आणि काही लोक कोसळून पडतात. स्व-सहानुभूती शक्यतो तुम्हाला कोसळवणार हे लक्षात घ्या.तिथे मला एपिक्टेटसची वृत्ती सर्वोत्तम वाटते.

आयुष्यातील प्रत्येक दुर्घटना ही तुम्हाला पुन्हा नाविन्याची उभारी घेण्यासाठी मिळालेली नवी संधी आहे असे त्याला वाटत होते.जीवनातील प्रत्येक दुर्घटना म्हणजे काहीतरी नवीन शिकण्याची संधी घेऊन येते आणि तुमचे काम स्व-सहानुभूतीमध्ये बुडून जाणे नाही,तर त्या भयंकर आघाताचा आपल्या आयुष्याला अधिक विधायक पद्धतीने आकार देण्यासाठी उपयोग करणे हे आहे."


चार्ली मंगर यांना विनम्र अभिवादन.त्यांच्या शिकवणी आयुष्यभर साथ देतील.


६/१२/२३

अखंड आशिर्वाद-Eternal blessings...

असाच एके दिवशी नेहमीच्या जागेवर भिक्षेकरी तपासण्यासाठी गेलो असताना,चांगल्या कपड्यातली एक आजी लगबगीने माझ्या कडे आली आणि काहीही कळण्याआधीच माझा हात हातात घेवुन कपाळाला लावून हमसुन हमसुन रडायला लागली . 


मला काहीच कळेना... ! 


खूप वेळ ती माझ्या गळ्यात पडुन नुसती रडत होती... आम्हाला पाहुन रस्त्यावरचे लोक फोटो काढत होते.

लोकांना दुस-याचा तमाशा पहायला आवडतो..! आपलं ठेवायचं झाकुन,आणि दुस-याचं पहायचं वाकुन.... !!! 


आजीचा रडण्याचा भर ओसरल्यावर मी तिची चौकशी केली,म्हणाली... मला एक मुलगा आहे, सुन आहे,नातवंडं आहेत,खुप गणगोत आहेत.परंतु माझं सर्व मी मुलाला नावावर करुन दिल्यावर तो आता लक्ष देत नाही.सुन खायला देत नाही,उठता बसता मरत का नाहीस म्हातारे? असे टोमणे मारते.अजुन किती दिवस फुकट खाणार गं ? असं विचारते. 


मी फुकट खात नाही हो डाॕक्टर ... माझ्या नावावरचं घर मी त्यांच्या नावावर केलंय... खरंतर ते माझ्या घरात राहतात...मी नाही... पण मी ते बोलुन दाखवत नाही ! 


सुनेन नातवंडांना माझ्याविषयी  काहीतरी भरवलंय,ही छोटी मुलंही मला घालुन पाडुन बोलतात.मुलाला हे सांगितलं तर,मुलगा दारू पिऊन मलाच मारहाण करतो.


मला जगायचं नाही डॉक्टर... बाळ गर्भारपणात पोटातुन लाथ मारतं,तेव्हा प्रत्येक आईला आनंदच होत असतो... पण सर्वस्व देवुनही म्हातारपणात या वयात पोरगा लाथ मारतो ते सहन होत नाही हो..! 


डाॕक्टर ,मला कसलंतरी इंजेक्शन देऊन गुपचुप मारून टाका... मी वाटलं तर कागदावर अंगठा देते.... पण मला मारुन टाका...आता नाही सहन होत....असं म्हणून ती गळ्यात पडून पुन्हा रडू लागली...मला तिचं रडू पहावेना.! 


तीची कशीबशी मी समजूत काढली आणि म्हणालो मी काय मदत करू शकतो तुम्हाला आजी ?खरं तर मी फक्त भीक मागणाऱ्या समाजासाठीच काम करतो,तरीही मी काहीतरी प्रयत्न करेन.आजी जगण्याला वैतागली होती, सारख्या मरणाच्या गोष्टी करत होती. तिला त्या घरात परत जायचंच नव्हतं.ब-याच वेळाने आजी म्हणाली माझी कुठं आश्रमात सोय होईल का ? 


हा प्रश्न ऐकून मीच शहारलो...कारण सध्या कोरोना च्या काळात कोणताच वृद्धाश्रम नवीन लोकांना स्वीकारत नाहीय. अशाही परिस्थितीत मागच्या दोन आठवड्यांपूर्वी एका बाबांची कशीतरी सोय लावली होती, त्यांची "शाल" हृदयात जपुन ठेवली आहे, ठेवणारच आहे.... पण  आता या आजीची सोय कुठे करावी मला काही कळत नव्हतं..! 


मला हो म्हणणं शक्य नव्हतं आणि नाही म्हणणं जड जात होतं...!  आजीच वय ८० असावं...


या वयात धडधाकट मुलाने तिला सांभाळण्याऐवजी तो तिला मारतो हे ऐकून अंगावर काटा आला...मी म्हटलं,

आजी तुझ्या मुलाला मी भेटतो आणि त्याच्याशी बोलतो, माझी भेट करून दे.'  


आजी म्हणाली, 'नाही बाळा, तो तुलाही मारेल आणि मलाही मारेल, मला त्याच्या पुढे नेऊ नकोस... ' थरथर कापत आजी म्हणाली... घाबरून थरथर कापणा-या मुलाला आयुष्यंभर हात देवुन, पदरात घेणारी आई, आज मुलाच्या भितीनंच थरथर कापत होती.... !


मला वाईट वाटलं... ! 


मी म्हणालो, 'मग पोलीस स्टेशनला कंप्लेंट देऊया का ?'


हातातल्या पिशवीशी सुरकुतलेल्या हातांनी चाळा करत ;खाली बघत,डोळ्यात पाणी आणून ती माऊली म्हणाली,"नको रे बाळा,पोलीस स्टेशनला कंप्लेंट केली तर,पोलीस त्याला खूप मारतील...

माझ्या लेकराला कुणी मारलेलं मला नाही सहन होणार ...! ती पुन्हा रडायला लागली…म्हातारीची ही वाक्यं ऐकुन मीच गलबललो... आयला,म्हातारे तु मला रडवलंस म्हणत, आता मीच तीच्या गळ्यात पडलो... स्वतः इतक्या विपन्नावस्थेत असुनही ती माझ्या पाठीवर सुरकुतलेला हात फिरवत धीर देत म्हणाली.... उगी ... उगी... तु का रडतोहेस बेटा... ? तुला काही त्रास आहे का ? सांग हो मला.... !


ती पुन्हा आई झाली होती ... आणि मी नुकतंच जन्मलेलं बाळ... ! सुरकुतलेला हा हात म्हणजे... हजार चिंध्या एकत्र करुन,टाके मारुन शिवलेली "वाकळ" वाटली मला... जगातली सारी ऊब या वाकळीत एकवटलेली असते... ! 


रजई,ब्लँकेट,शाॕल ही नुसती थेरं आहेत... 


पांघरायला वाकळ आणि डोक्यावर म्हातारीचा सुरकुतलेला हात हेच ख-या श्रीमंतीचं लक्षण..!


आ धार देते ती आई ! 

आ पलं म्हणते ती आई !!

आ सुदे रे  म्हणत पोटात घेते  ती आई !!! 

'ई' श्वराची 'आ' ठवण होवुच देत नाही ती आई..! पोटात घेते ती "माती"... पोटातुन जन्म देते ती "माता" फरक एका वेलांटीचा ! 


इतका त्रास देणाऱ्या मुलाला पोलीस मारतील या कल्पनेनं ती माऊली शहारली.मी पोलीस कंप्लेंट करणार नाही,याचं तीनं वचन घेतलं माझ्याकडुन तरीही म्हणाली,नकोच माझा त्रास त्यांना,जगुदे सुखानं...जमलं तर कर सोय माझी...नाहीतर मारुन टाक..तीने मला पर्यायच नाही ठेवला..! 


आता कुणाला फोन करू मला काही कळेना ! 

या काळात तीला कुणी स्विकारणार नाही,मला माहित होतं.... ! मला छोटा भाऊ समजणाऱ्या एक ताई आहेत,त्या परभणी मध्ये एक छोटासा वृद्धाश्रम चालवतात. त्यांना भीत-भीत फोन लावला.त्यांनी हो म्हणण्याची अपेक्षाच नव्हती,परंतु आजीची सर्व परिस्थिति ताईला सांगितली.वर आजीशी व्हिडिओ कॉल वर बोलणं करून दिलं. 


ताईला म्हणालो, 'या आजीशी आजच ओळख झालीये माझी... पण हिच्यात मला माझी आई दिसते...या वयात मुलगा तीला मारतो,या माराने कदाचित तीचा जीव जाईल.... आणि माराने नाही गेला तर उपासमारीनं जाईल,उपासमारीनंही नाही गेला तर सुनेच्या टोमण्यांनी तीचा जीव जाईल... ! 


मला ती जगायला हवी आहे...,मरेल तेव्हा मुलगा म्हणुन अंत्यसंस्कार मीच करणार आहे !' 


हे बोलणं ऐकतानाच या माझ्या ताईच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. 


आजीशी बोलणं झाल्यावर काहीही विचार न करता ताई मला म्हणाल्या,'दादा,आईला पाठवून दे लवकरात लवकर परभणीला...तू जर तिला आई म्हणत असशील तर माझी सुद्धा ती आईच झाली की रे ! आणि आपण आपल्या आईला असं रस्त्यावर कसं सोडणार ? तीला सांग, तुला एक मुलगी पण आहे म्हणावं... ! मी आपली आई म्हणून सांभाळ करीन तिचा...! 


मी मनातूनच ताईला साष्टांग नमस्कार घातला.! 


सख्खा मुलगा सांभाळत तर नाहीच, उलट मारहाण करतो आणि ही कोण कुठली ताई केवळ माझ्या शब्दाखातर या आजीला आपली आई म्हणून आयुष्यंभर सांभाळण्याची प्रतिज्ञा करते... ! 


ताई तुला प्रणाम माझा... !

आजी काल मंगळवारी मला भेटली. 


आज आणि उद्या म्हणजे बुधवार,गुरुवार दोन दिवस सर्व कागदपत्रे, पोलीस स्टेशन आणि इतर काही कायदेशीर बाबी पुर्ण करण्यात मला दोन दिवस तरी लागतीलच.

शेवटचे दोन दिवस आजी त्या घरात कसेतरी काढ असं तिला सांगून आलोय.आईला नेल्यावर,भविष्यात दारुड्या मुलाने आणि सुनेने माझ्याविरुद्ध काही कांगावा करायला नको म्हणून त्या मतदारसंघातील नगरसेवक यांनाही मध्यस्थ म्हणून मी घेतलं आहे.या शुक्रवारी दि. २५ सप्टेंबर २०२० रोजी सकाळी आठ वाजता आजीला मी परभणीला पाठवून देत आहे.सायंकाळी ती परभणीला पोचेल. सौ सुनीताताई अहिरे या माझ्या ताई अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत परभणी मध्ये वृद्धाश्रम चालवत आहेत.यांच्याचकडे आपण आजीची सोय करणार आहोत. आजीला भेटुन मी हे सर्व सांगितलं...म्हणालो, 'म्हातारे मज्जा आहे तुझी,आता कायम लेकीकडं राहशील...!' 


आजी म्हणाली,'अरे लेकीकडं पहिल्यांदाच जाणार मी, तीला साडी चोळी नको करायला ? जावईबापुलाही काहीतरी द्यावे लागेल... अधिक मास चालु आहे... तु काय म्हणतोस ?' 


दात नसलेल्या तोंडातुन आजी हरखुन बोलत होती.


मी गंमतीनं म्हणालो,'म्हातारे,न पाहिलेल्या लेकीला साडीचोळी, न पाहिलेल्या जावयाला अधिक महिन्याचं काहितरी गिफ्ट... आणि तुझ्या समोर उभ्या असलेल्या लेकाला काय ?' 


यावर ती आवेगानं माझ्या जवळ आली आणि माझं डोकं स्वतःच्या खांद्यावर टेकवत म्हणाली, 'माज्या सोन्या तुला अखंड आशिर्वाद ... !'


सुरकुतलेला तो हात आणि मळलेला तो पदर माझ्या अश्रुंनी भिजला नसता तरच नवल..! हा अखंड आशिर्वाद डोक्यावर घेवुन मी वाट बघतोय शुक्रवार च्या संध्याकाळची..!


याच संध्याकाळी आजी सुनिताताई ला भेटणार आहे...संध्याकाळीच दिवस आणि रात्रीची गळाभेट होत असते...  मी ही वाट बघतोय,माय लेकींच्या गळा भेटीची... ! सरत चाललेला सुर्य आणि उगवणारा चंद्र भेटतील याच दिवशी... !


मी ? .... मी कोण... ? 

मी फक्त अखंड आशिर्वाद घेतलेला.... 

साक्षीदार,या गळाभेटीचा ! 


बुधवार २३ सप्टेंबर २०२०


डाॕ.अभिजीत सोनवणे - भिक्षेकऱ्यांचे डॉक्टर

डाॕक्टर फाॕर बेगर्स

४/१२/२३

कफनीवाला आणि बिबळ्या.. Kafniwala and Leopard..

माझ्या या अपयशी मोहिमेवरून गारठलेल्या, थकलेल्या अवस्थेत रुद्रप्रयागची वाट उतरत असताना मी अतिशय निराश झालो होतो. अगदी कोणत्याही दृष्टीने पाहिलं तरी कमनशीबाने माझ्याबरोबर आणि आख्ख्या गढवाली जनतेबरोबर रडीचा डाव खेळला होता.

जिथे नरभक्षकाचा संबंध येतो तेव्हा या सर्व पहाडी मुलुखातली माणसं मला अतिंद्रिय शक्ती प्राप्त झालेली व्यक्ती मानतात;मला ते कितीही आवडत नसलं तरीही..!

मी त्यांच्या मदतीला येतोय ही बातमी इथे माझ्या आगमना अगोदरच पोचली होती.रुद्रप्रयागच्या कित्येक मैल अगोदर जी जी माणसं मला वाटेत भेटली,शेतात काम करत असताना ज्यांनी ज्यांनी मला पाह्यलं त्या सर्वांनी अतिशय विश्वास दाखवून मला ज्याप्रकारे शुभेच्छा दिल्या तो सर्व प्रकार अत्यंत हृदयस्पर्शी होता,पण तितकाच अस्वस्थ करणाराही ! जसजसा मी रुद्रप्रयागच्या जवळ येत गेलो तसतशी त्याची तीव्रता वाढतच गेली.

माझ्या रुद्रप्रयागमधल्या नाट्यमय प्रवेशाला जर कोणी साक्षीदार असता तर त्याला विश्वास ठेवणं कठीण गेलं असतं की मी एखादा जगज्जेता नसून स्वतःच्या मर्यादाचं भान असलेला एक सामान्य माणूस होतो! मला जाणीव होती की हे जे काही काम आपण हातात घेतलंय ते काम माझ्या ताकदीपलीकडचं आहे.अतिशय रौद्र,अवघड आणि पहाडी प्रदेशातल्या पाचशे चौ.मैलांमधल्या जवळजवळ पन्नास-साठ बिबळ्यांमधून नरभक्षकाला हुडकून त्याला मारायचं काम अशक्यप्रायच वाटत होतं आणि जसजसा मी हा नितांत सुंदर प्रदेश पहात गेलो तसतसं मला ते अधिकच अशक्य वाटायला लागलं.पण माझ्या ह्या भावना त्या लोकांपर्यंत पोचणं शक्य नव्हतं.त्यांच्या दृष्टीने कित्त्येक नरभक्षकाच्या तावडीतून इतरांना सोडवणारा अशी माझी प्रतिमा होती आणि आताही मी तशाच कामासाठी गढवालला आलो होतो. त्यातही,आल्यापासून २४ तासांच्या आत मी नरभक्षकाला माझ्याकडचा बोकड मारायला भाग पाडलं होतं आणि अंधार पडल्यावरही जंगलात राहायचा धोका पत्करून त्या बिबळ्याला अलकनंदा नदी ओलांडून नदीच्या या बाजूला यायला प्रवृत्त करू शकलो होतो.


या माझ्या पहिल्या यशानंतर त्या बाईचा बळी गेला होता.मी पुढची मनुष्यहानी टाळण्याचा माझ्या दृष्टीने खूप प्रयत्न केला होता पण तो फसला.या घटनेमुळेच मला लगेचच पुन्हा एकदा नरभक्षकाशी संपर्क साधण्याची संधी मिळाली होती.काल त्या गावातल्या माणसांबरोबर डोंगर चढत असताना माझ्या यशापयशाचा अंदाज बांधला तेव्हा मला खात्री वाटली की यशाची शक्यता दोनास एक तरी होती;अगदी या बिबळ्याची एका भक्ष्यावर दोनदा न येण्याची सवय माहीत असून व त्या अंधाऱ्या रात्रीत माझ्याकडे शूटींग लाईट नसूनसुद्धा! जेव्हा मी मायकेल कीनला गढवालला जाण्याची माझी तयारी आहे असं सांगितलं तेव्हा त्याने मला विचारलं होतं की आवश्यक ती सर्वसाधनसामग्री माझ्याकडे आहे का? जेव्हा त्याला समजलं की माझ्याकडे इलेक्ट्रिक शूटींग लाईटचीच कमी आहे व त्यासाठी मी कलकत्याला टेलिग्राम करणार आहे तेव्हा त्याने मला वचन दिलं की यासाठी शासनाकडून वाट्टेल ती मदत मिळेल व मी रुद्रप्रयागला पोचण्याच्या आत उत्कृष्ट दर्जाचा इलेक्ट्रिक शूटींग लाईट तेथे पोचला असेल.मी रुद्रप्रयागला पोचल्यानंतर जेव्हा मला कळलं की अजूनही लाईट आलेला नाही तेव्हा मला जरा वाईट वाटलं.पण रात्रीसुद्धा पुरेसं दिसण्याची माझी क्षमता गृहीत धरूनच मी यशापयशाचं गुणोत्तर दोनास एक असं तोललं होतं.म्हणूनच आज रात्री काम तमाम झालंच पाह्यजे या जिद्दीने मी बरोबर जास्तीची रायफल व शॉटगन घेतली होती. जेव्हा गंजीवरल्या माझ्या बैठकी

वरून मी समोरच्या एकूण दृश्याचा आढावा घेतला - कमी रेंजवरून शॉट घेण्याची संधी,माझा शॉट चुकला व बिबळ्या फक्त जखमी झाला तरी त्याला हमखास मृत्यूच्या दाढेत अडकवणारा गनट्रॅप- तेव्हा मात्र मला यशाची खात्री खूपच जास्ती वाटू लागली. पण... नंतरचं ते वादळ,माझ्या क्षमतेचाही काही उपयोग होऊ नये इतकी अंधारी रात्र आणि त्यात इलेक्ट्रिक लाईट नसणे... सरतेशेवटी प्रयत्न फसलाच व हे अपयश काही तासातच दहशतीखाली असलेल्या गढवालच्या रहिवशांना समजणार होतं ! थोडा व्यायाम,कढत पाण्याने आंघोळ आणि जेवण यामुळे नेहमी निराश मूडवर चांगला परिणाम होतो.डोंगर उतरून बंगल्यावर आल्यावर गरम पाण्याने आंघोळ आणि नंतर भरपेट नाश्ता झाल्यावर मी हळूहळू या 'कमनशीबाच्या' विचाराच्या गर्तेतून बाहेर आलो व एकूण सर्वच अपयशाचा सारासार विचार करायला लागलो.जमीनीत घुसलेल्या गोळीमुळे आलेलं नैराश्य हे वाळूवर सांडलेल्या दुधासारखंच होतं आणि जर अजूनही बिबळ्याने अलकनंदा नदी ओलांडली नसेल तर माझ्याकडे संधी होती कारण आता माझ्याकडे त्या शूर माणसाने वादळाची व मृत्यूची पर्वा न करता आणलेला लाईट होता.


आता त्या बिबळ्याने नदी ओलांडली आहे की नाही हे तपासणं सर्वप्रथम आवश्यक होतं.दोन झुलत्या पुलांवरून हे शक्य आहे याची खात्री असल्याने ब्रेकफास्ट झाल्यानंतर मी कामाला लागलो.डोक्यापासून काही इंचावरून सुसाटत गेलेल्या जड रायफलच्या बुलेटमुळे बिबळ्याला बसलेला धक्का कितीही जोरदार असला तरी त्यानंतर स्वच्छ उजेड पडण्याच्या मधला वेळ इतका कमी होता की तेवढ्या वेळात तिथून ते चटवापिपल पुलापर्यंतचा १४ मैल रस्ता पार करणं बिबळ्याला अशक्य होतं.त्यामुळे मी माझं सर्व लक्ष फक्त रुद्रप्रयागमधल्या पुलावरच केंद्रित करायचं ठरवलं.या पुलाकडे तीन वाटा येत होत्या.एक उत्तरेकडून,दुसरी दक्षिणेकडून आणि त्या दोन पायवाटांच्या मधून रुद्रप्रयाग बाजाराकडून येणारी चांगले मळलेली एक वाट होती.या पायवाटा तपासल्या

नंतर मी पूल ओलांडला आणि चांगल्या अर्ध्या मैलापर्यंत केदारनाथ रस्ता व तीन दिवसापूर्वी तो बोकड मारला गेला ती पायवाटही तपासली.बिबळ्याने नदी ओलांडली नाही याची खात्री झाल्यानंतर मी दोन्ही ब्रिज बंद करून त्या बिबळ्याला,नदीच्या माझ्या बाजूला स्थानबद्ध करण्याच्या नियोजनानुसार कामाला लागलो.योजना अतिशय साधी सरळ होती आणि नदीच्या या बाजूला पुलाच्या अगदी जवळ राहणाऱ्या रखवालदाराचं सहकार्य मिळालं तर हमखास यशस्वी होण्यासारखी होती.जवळ जवळ तीस मैल लांबीच्या मोठ्या पट्ट्यात नदीच्या दोन्ही तीरांवरच्या गावांमधलं दळणवळण व संपर्क तोडणं हे वाचताना फार कठीण वाटेल,पण प्रत्यक्षात तितकंसं कठीण गेलं नाही.

कारण नरभक्षकाने लादलेल्या संचारबंदीमुळे हा ब्रिज रात्रीच्या वेळात ओलांडण्याचं धैर्य तिथं कोणाकडेही उरलं नव्हतं.पुलाला आधार देणाऱ्या दोन्ही बाजूच्या पोलादी केबल्स ज्या टॉवर्सच्या आधाराने खेचल्या होत्या त्यांच्या कमानीमध्ये काटेरी झुडपं लावून ते बंद केले गेले.त्यानंतर ते बंद असल्याच्या व मी पहारा देत असल्याच्या काळात एकाही माणसाने पूल ओलांडायची परवानगीसुद्धा मागितली नाही.


मी डाव्या तीरावरच्या टॉवरवर एकूण वीस रात्री पहारा दिला व या रात्रींचा अनुभव मी कधीही विसरू शकणार नाही.नदीकाठच्या पुढे आलेल्या मजबूत खडकांवर ते टॉवर्स बांधले होते आणि त्या टॉवर्सवरचे आठ फूट लांब व चार फूट रुंद प्लॅटफॉर्म् स भन्नाट वाऱ्यामुळे गुळगुळीत झाले होते.टॉवर्सची उंची वीस फूट होती.या प्लॅटफॉर्मच्या वर पोचण्याचे दोनच मार्ग होते. मनोऱ्याच्या अगदी वरच्या बाजूला असलेल्या भोकातून जाणाऱ्या आणि पुढे साठ फुटांवर जमीनीत खोलवर गाडलेल्या केबल्सवरून लटकत जाणे किंवा एका तकलादू शिडीवरून चढून जाणे.मला दुसरा मार्ग त्यातल्या त्यात बरा वाटला.कारण त्या केबल्सवर एक घाणेरड्या वासाचं काळपट बुळबुळीत आवरण चढलं होतं;ते एकतर हाताला चिकटायचं किंवा कपडे कायमचे खराब होण्याची भीती होती.ही 'शिडी' म्हणजे सुतळीने सैलसर बांधलेल्या आडव्या समांतर काठ्या एकमेकांना जोडणारे विषम लांबीचे दोन बांबू होते.ही शिडी प्लॅटफॉर्मच्या खाली चार फुटांपर्यंतच पोचायची.सर्वात वरच्या काठीवर तोल सांभाळत उभं राहून गुळगुळीत प्लॅटफॉर्मवर माझे तळहात रोवून केवळ तेवढ्याच पकडीवर,

देवावर हवाला ठेवून त्या प्लॅटफॉर्मवर चढता यायचं,

हा प्रकार म्हणजे एक डोंबाऱ्याचा खेळ होता व तो दररोज खेळूनही माझी भीती काही कमी झाली नाही.हिमालयातल्या या भागातल्या सर्व नद्या उत्तरेकडून दक्षिणेकडेच वाहतात.आणि ज्या खोऱ्यातून त्या वाहतात त्या खोऱ्यातला वारा सूर्योदय तसेच सूर्यास्ताला दिशा बदलतो. दिवसाउजेडी हा वारा 'डाडू' म्हणून ओळखला जातो व तो दक्षिणेकडून उत्तरेकडे वाहतो.रात्री मात्र तो उलट्या दिशेने वाहतो.


मी प्लॅटफॉर्मवर जागा घेण्याच्या सुमारास हा वारा पडलेला असायचा.नंतर जसजसा प्रकाश कमी होत जाई तसतसा हलक्या झुळकीपासून सुरू होऊन त्याचा वेग वाढत जायचा आणि मध्यरात्रीपर्यंत त्याने झंझावाताचं रूप धारण केलेलं असे.प्लॅटफॉर्मवर आधाराला पकडण्यासाठी काहीच नव्हतं.घर्षण वाढवण्यासाठी किंवा वाऱ्याचा दाब कमी करण्यासाठी पालथं झोपलं तरी साठ फूट खाली खडकावर फेकलं जायची भीती असायचीच.

या खडकांवरून कोसळल्यावर तिथून सरळ अलकनंदाच्या गोठवण्याऱ्या पाण्यातच जलसमाधी! खरंतर साठ फूट खाली धारदार खडकांवर आपटल्यानंतर पाण्याच्या तापमानाबद्दल विचार करण्याची गरजच नाही, पण गंमतीशीर गोष्ट म्हणजे जेव्हा म्हणून मला खाली कोसळण्याची भीती वाटायची तेव्हा तेव्हा माझ्या मनात खडकाचा नव्हे तर गोठवणाऱ्या पाण्याचाच विचार यायचा! या त्रासाच्या भरीत भर म्हणजे त्या प्लॅटफॉर्मवर अगणित मुंग्या होत्या आणि त्या कपड्यांमध्ये शिरून कातडी सोलून काढायच्या.या वीस रात्रीमध्ये ती कमानीतीलं झुडुपं काढली जायची आणि आणि या सर्व काळात फक्त एकच प्राणी तो पूल ओलांडून गेला...

एक कोल्हा!


दरदिवशी पुलावर येताना माझ्या बरोबर माझी माणसं ती शिडी घेऊन यायची आणि मी शिडीवरून वर गेलो की माझ्या हातात रायफल दिल्यावर शिडी घेऊन निघून जायचे.दुसऱ्या दिवशी तिथे आलो तेव्हा आम्हाला एक ढगळ लाल पांढरी कफनी घातलेला माणूस दिसला. त्याच्या डोक्यावर,छातीवर काहीतरी चमकत होतं,हातात चांदीचा क्रॉस होता आणि तो केदारनाथच्या दिशेकडून येत होता.पुलावर पोचल्यावर तो माणूस वाकला व समोर क्रॉस धरून डोकं झुकवलं.अशा स्थितीत काही क्षण राह्यल्यावर त्याने क्रॉस उंच धरला,परत ताठ उभा राह्यला,

काही पावलं टाकली व परत वाकून डोकं झुकवलं.संपूर्ण पूल त्याने या पद्धतीने ओलांडला.माझ्या शेजारून जाताना त्याने सलाम केला पण तो त्याच्या प्रार्थनेत मग्न असल्याने मी त्याच्याशी काही बोललो नाही. डोक्यावरच्या आणि छातीवरच्या कपड्यांवर मगाशी जे काही चमकताना दिसत होतं ते चांदीचे छोटे छोटे क्रॉसच होते.या सर्व प्रकाराबाबत माझ्याप्रमाणेच माझ्या माणसांचीही उत्सुकता चाळवली गेली.तो नदीकाठचा चढ चढून रुद्रप्रयाग बाजाराच्या दिशेने जात असताना त्यांनी मला विचारलं की नक्की हा काय प्रकार असावा? तो कोणत्या देशातून आला असावा ? तो ख्रिश्चन होता हे तर उघड दिसत होतं पण आमचं प्रत्यक्ष संभाषण न झाल्याने बाकी काही तपशील कळला नव्हता. पण त्याचे लांब काळे केस,काळी कुळकुळीत दाट दाढी व चेहरेपट्टी ह्यावरून तो उत्तर भारतातलाच असावा असा माझा अंदाज होता.मॅनइटींग लेपर्ड ऑफ रुद्रप्रयाग मूळ लेखक - जिम कॉर्बेट,अनुवाद - विश्वास भावे,आरती प्रकाशन 


दुसऱ्या दिवशी सकाळी माझ्या माणसांनी आणलेल्या शिडीवरून उतरून बंगल्याकडे निघत असताना मला रस्त्यालगतच्या मोठ्या शिळेवर उभा राहून नदीकडे निरखून पाहत असलेली ती घोळदार डगल्यातील व्यक्ती परत दिसली.मला पाह्यल्यावर तो शिळेवरून उतरून माझ्याकडे आला आणि हसून ओळख दिली.मी त्याला इथे येण्याचा उद्देश विचारल्यावर तो म्हणाला की तो फार दूरवरून गढ़वाली लोकांना छळणाऱ्या सैतानी दुष्टात्म्या

पासून त्यांना मुक्ती देण्यासाठी आलाय.हे सर्व तो कसं काय करणार या माझ्या पुढच्या प्रश्नावर त्याने उत्तर दिलं की तो वाघाची एक प्रतिमा तयार करणार आहे व नंतर मंत्र म्हणून त्या दुष्टात्म्याला प्रतिमेत प्रवेश करायला भाग पाडणार आहे.त्यानंतर ती प्रतिमा गंगेमध्ये लोटून देणार आहे,तिथून ती वाहत वाहत सागराला मिळेल.त्यानंतर परत तो दुष्टात्मा इथल्या लोकांना त्रास देणार नाही.

त्याचा उद्देश तो सफल करू शकेल की नाही याबद्दल मला कितीही शंका असली तरी त्याने स्वतःहून स्वीकारलेल्या कार्याबद्दलची त्याची निष्ठा आणि विश्वास याचं मात्र मला मनोमन कौतुकच वाटलं. दररोज मी बंगल्याकडे निघत असताना तो तिथे आलेला असायचा व संध्याकाळी टॉवरवर परत यायचो तेव्हाही तो त्याचे बांबू,

दोऱ्या,रंगीबेरंगी कापडं- चिंध्या यांच्या सहाय्याने 'वाघ' बनवण्याच्या कामात मग्न असायचा.त्याचं काम जवळपास पूर्ण झालेलं असताना एकदा मोठं वादळ आलं आणि त्याची ती कलाकृती पूर्ण उद्ध्वस्त झाली. पण... ठीक आहे... गाणी गुणगुणत पुन्हा एकदा त्याने त्याचं काम सुरू केलं! सरतेशेवटी घोड्याएवढ्या आकाराचा व कोणत्याही प्राण्याशी साधर्म्य न साधणारा असा तो 'वाघ' त्याच्या पसंतीस उतरेल इतपत तयार झाला.

कुठल्याही प्रकारचा 'तमाशा' चालला असेल तर एकतरी पहाडी माणूस त्याची मजा चाखल्याशिवाय राहील काय? एका लांब काठीला तो 'वाघ' बांधून जेव्हा त्याला नदीकाठची उतरंड उतरून नदीच्या वाळवंटावर नेलं जात होतं तेव्हा जवळपास शंभर-दीडशे माणसं त्या वरातीत सामील झाली होती आणि त्यातले काही जण भांडी,ढोल-ताशे व तुताऱ्या वाजवत होते.नदीच्या वाळवंटात ती प्रतिमा सोडण्यात आली. डोक्यावर तसेच छातीवर क्रॉसेस लावलेला आणि हातात सहा फूट उंच क्रॉस घेतलेला तो माणूस वाळूत गुडघ्यावर बसला आणि अतिशय तन्मयतेने मंत्र म्हणून त्याने त्या दुष्ट्यात्म्याला त्या प्रतिमेत प्रवेश करायला भाग पाडलं.शेवटी तुताऱ्या,ढोल यांच्या गजरात ती भलीथोरली प्रतिमा गंगेच्या प्रवाहात लोटण्यात आली. मिठाई,फुलं यांचा नैवेद्य अर्पण करून शेवटी ती प्रतिमा तिच्या सागराकडच्या अंतिम प्रवासाला लागली.दुसऱ्या दिवशी तो साधू तिथं दिसला नाही.तेव्हा नदीवर सकाळी आंघोळीला आलेल्या काही माणसांना मी विचारलं की तो ढगळ कफनीवाला कुठे आहे, तो कुठे गेला? त्यावर ते म्हणाले, 'साधूपुरुष कुठून येतात हे कुणी सांगू शकेल का साहेब? आणि कोठे चाललात असा प्रश्न तरी त्यांना कोण विचारू शकतो का?'


कपाळाला चंदनाचा गंध लावलेली,त्याला साधूपुरुष म्हणणारी व कालच्या समारंभात भाग घेतलेली सर्व मंडळी हिंदू होती! पासपोर्ट,ओळखपत्र बगैरे काहीही प्रकार अस्तित्वात नसलेल्या आणि धर्माचा प्रभाव असणाऱ्या या देशात भगवी कफनी घालून,भिक्षेचा कटोरा हातात घेऊन किंवा छाती व डोक्याला क्रॉस लावून कोणीही माणूस अगदी खैबरखिंडीपासून ते कन्याकुमारीपर्यंत सहज भटकू शकेल... आणि त्याला कोणताही प्रश्न विचारला जाणार नाही याबद्दल माझी खात्री आहे.


३१.१०.२३ या लेखमालेतील पुढील भाग..