* विजय गायकवाड | Vijay Gaikawad

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

१९/३/२४

ॲरिस्टॉटलचे आव्हान.. Aristotle's challenge..!!


"राग कोणालाही येऊ शकतो - रागावणे फार सोपे आहे;परंतु योग्य व्यक्तीवर,योग्य प्रमाणात, योग्य वेळी,योग्य कारणासाठी आणि योग्य रीतीने रागावणे हे मात्र सोपे नाही." ॲरिस्टॉटल - द निकोमॅकिअन एथिक्स


त्या दिवशी दुपारी न्यूयॉर्कच्या हवेत ऑगस्ट महिन्याची असह्य घामट उष्णता दाटलेली होती. लोकांचा जीव घाम आणि उकाड्याने बेजार झाला होता.मला हॉटेलला जायचे होते म्हणून मी बसची वाट पाहत मॅडिसन ॲव्हेन्यूवर उभा होतो.बसमध्ये चढताना बसच्या ड्रायव्हरने उत्साहपूर्ण स्मित करीत 'हाय,कसं चाललंय?' असे म्हणत माझे ज्या थाटात स्वागत केले,ते पाहून मला धक्काच बसला.तो मध्यमवयीन कृष्णवर्णीय माणूस होता.शहराच्या रहदारीतून बस मुंगीच्या पावलांनी पुढे जात असताना तो बसमध्ये चढणाऱ्या प्रत्येकाचे असेच जोशपूर्ण स्वागत करीत होता.प्रत्येक प्रवासी माझ्यासारखाच आश्चर्याने थक्क होत होता. हैराण करणाऱ्या उष्णतेने दुर्मुखलेल्या प्रवाशांपैकी फक्त काही जणांनी त्याच्या स्वागताला प्रत्युत्तर दिले.


पण जसजशी बस रेंगाळत पुढे जाऊ लागली तसतसा बसमध्ये हळूहळू का होईना;पण काहीसा जादुई बदल घडून आला.बस जिथून जात होती तिथल्या आजूबाजूच्या परिसराबद्दल ड्रायव्हर प्रवाशांना माहिती देऊ लागला.

त्याच्या चैतन्यमय धावत्या समालोचनात तो सांगत होता, अमक्या दुकानात भव्य 'सेल' लागला आहे, हे संग्रहालय खूप पाहण्यासारखे आहे बरं का आणि हो,त्या चित्रपटगृहात नुकत्याच लागलेल्या चित्रपटाबद्दल तुम्ही काही ऐकले आहे का? त्या शहरात काय काय विलोभनीय गोष्टी आहेत. याचा 'संसर्ग' त्याच्या खेळकर सुरातून इतरांनाही झाला.लोकांनी बसमध्ये चढताना धारण केलेले खिन्नपणाचे कवच कधी गळून पडले हे कोणालाच कळाले नाही.प्रत्येकजण आपल्या स्टॉपवर उतरत असताना हा आपला मोठ्याने ओरडून म्हणायचा,

"बरंय, या मजेत दिवस घालवा!" आणि प्रत्येकजण त्याला सस्मित प्रतिसाद देत बसमधून उतरू लागला.


या घटनेला वीस वर्षे होत आली तरी माझ्या मनाने तिची आठवण कायम ताजी ठेवली. त्यादिवशी बसमध्ये चढलो तेव्हा मी नुकताच मानसशास्त्रातील माझा प्रबंध पूर्ण केला होता; परंतु असे परिवर्तन कसे घडू शकते याविषयी त्या काळी मानसशास्त्र फार त्रोटक लक्ष घालायचे.भावनांच्या कार्याविषयी मानसशास्त्राला अजिबात माहिती नव्हती किंवा फार थोडी माहिती होती.तरीही हा बस ड्रायव्हर त्याच्या बसमध्ये प्रवेश करणाऱ्या प्रवाशांमध्ये चांगल्या भावनेचा 'किटाणू' पसरवण्याचा विचार करीत होता,बहुधा या चांगल्या भावनेचे तरंग सगळ्या शहरात पसरले असतील.आपल्या बसमधील उतारूंच्या हृदयाची दारे उघडून त्यात खदखदणारी चिडचिड,अस्वस्थपणा दूर करून त्यांचे हृदय मृदू बनवण्याची जादू करणारा हा माणूस मला एखादा शहरी शांतिदूत वाटला.


आता वर्तमानपत्रातील या आठवड्याच्या काही घटना पहा ज्या वरील घटनेच्या टोकाच्या विरोधात आहेत :


● एका स्थानिक शाळेतील नऊ वर्षांच्या मुलाने रागाने बेभान होत शाळेतला डेस्क,संगणक आणि प्रिंटर यांच्यावर रंग ओतला,शाळेच्या आवारात उभ्या असलेल्या गाडीला विद्रूप केले; कारण काय तर त्याच्या तिसरीतील काही वर्गबांधवांनी त्याला 'बाळ' म्हणून चिडवले होते आणि याला त्यांना दाखवून द्यायचे होते की, तो 'बाळ' नाही.


● मॅनहटन रॅप क्लबच्या बाहेर गोळा झालेल्या काही किशोरांच्या गर्दीत अनवधानाने लागलेल्या धक्क्याची परिणती ढकलाढकली व रेटारेटीत झाली.परिणामी अपमानित झालेल्या एका किशोराने ३८ कॅलिबरची स्वयंचलित बंदूक काढून गर्दीवर गोळ्या झाडल्यामुळे आठ किशोर जखमी झाले.अहवाल असे सांगतो की,अशा किरकोळ घटनांना आपला अपमान समजून केलेल्या अशा गोळीबाराच्या घटना अलीकडच्या काही वर्षात देशभरात सर्वसामान्य झाल्या आहेत.एका अहवालात हादरवून सोडणारे तथ्य असे दिसून आले की,

बारावर्षांखालील बालकांच्या खुनाच्या प्रकरणात खुद्द त्यांचे पालक किंवा सावत्र पालक दोषी असतात. पालकांच्या म्हणण्यानुसार,ते फक्त "त्यांच्या मुलांना शिस्त,वळण,लावायचा प्रयत्न करीत होते." ते टी.व्ही.पाहत असताना मूल टी.व्ही. समोर उभे राहिले,रडले किंवा त्याने अंथरूण खराब केली म्हणून त्याला इतकी मारझोड केली गेली की,त्यात हे मूल मरण पावले.


● पाच तुर्की मुली आणि स्त्रिया त्यांच्या घरात झोपलेल्या असताना घराला आग लावून त्यांना ठार मारल्याबद्दल एका जर्मन तरुणावर खटला चालवला जात आहे.नव-नाझीवादी गटाचा एक हिस्सा असलेला हा तरुण त्याची नोकरी न टिकणे,दारू पिणे आणि दुर्दैव यासाठी परकीयांना दोष देत त्यांचा बदला घेतला असे सांगतो.

कुजबुजल्या स्वरात तो विनवतो,"मी जे केले त्याबद्दल मला वाईट वाटते आणि त्याबद्दल मी अपार शर्मिंदा आहे."


प्रत्येक नवीन दिवस भरगच्च बातम्या आणतो की,सभ्यता आणि सुरक्षितता कशी विस्कळीत झाली आहे,माथेफिरूपणाने प्राणघातक हल्ला करण्याची क्षुद्र अनावर ऊर्मी कशी लोकांना कंठस्नान घालत हैदोस घालीत आहे;पण या प्रकारच्या बातम्या केवळ या गोष्टीला प्रतिबिंबित करतात की,आपल्या आणि आपल्या भोवतालच्या लोकांच्या जीवनात भावना नियंत्रणाबाहेर जाण्याचा आवेश मोठ्या प्रमाणात डोके वर काढू लागला आहे.प्रक्षोभ आणि पश्चात्तापाच्या या अनियंत्रित लाटेपासून कोणीच वाचू शकलेले नाही.या ना त्या मार्गाने ती आपल्या जीवनात येतेच येते.


गेल्या दशकात अशा वाढत्या अहवालांचे ढीग हीच बाब स्पष्ट करतात की,आपल्या कुटुंबात, समुदायात,आपल्या सामूहिक जीवनात भावना हाताळण्याची कौशल्यहीनता,

कमालीची निराशा आणि बेपर्वाईचा आलेख वरवर झेपावत आहे. या काही वर्षांत सळसळणारा राग आणि निराशा हा एक जुनाट रोग बनला आहे.बाळाची काळजी घेणाऱ्या व्यक्तीअभावी घराच्या एकांतात टी. व्ही.सोबत एकाकी पडलेली बालके असोत किंवा उपेक्षित,

अस्वीकृत,दुर्लक्षित किंवा वाईट वागवली गेलेली दुःखी मुले असोत किंवा वैवाहिक हिंसेच्या गलिच्छ जवळिकीला बळी पडलेली जोडपी असोत,सगळे या आजाराने पीडित आहेत.जगात सगळीकडे नैराश्याच्या वेगाने वाढत जाणाऱ्या आकड्यांतून पसरलेली भावनिक अस्वस्थता आणि धुसफूस दिसून येते आणि हिंसेची वाढती लाटही याच भावनिक अस्वस्थतेची आठवण देते.खिशात बंदूक बाळगणारे शालेय,किशोर,बंदुकीच्या स्कोटांनी संपणारी रस्त्यावरील भांडणे,दुर्घटना,आपल्याच सहकाऱ्यांना मारून टाकणारे,असंतुष्ट माजी कामगार हे सगळे याच आजाराचे पुरावे आहेत. भावनिक अत्याचार गाडी चालवताना बंदूक चालवणे,धक्कादायक घटनांनंतर येणारा ताण अशा संज्ञा गेल्या दशकात सर्वसामान्य शब्दकोशात स्थान घेऊ लागल्या आहेत. जेव्हापासून परस्परांन "दिवस चांगला जावो' अशा सदिच्छा देण्याच्या जागी 'दिवस पार पडू दे' अशा सुरक्षा केवच देणाऱ्या शब्दात झाल्यापासून वरील बदल घडले आहेत.हे पुस्तक अर्थशून्यतेतून अर्थ शोधण्याचे मार्गदर्शन करीत आहे.एक मानसशाखा म्हणून आणि गेली दहा वर्ष द न्यूयॉर्क टाइम्स'साठी वृत्तपत्र लेखक म्हणून काम करताना अतार्किकतेच्या क्षेत्राला समजून घेण्यात आपल्या शास्त्रांनी केलेल्या प्रगतीचा मी मागोवा घेत आलो आहे.(इमोशनल इंटेलिजन्स,भावनिक बुद्धिमत्ता,

डॅनिअल गोलमन,अनुवाद-पुष्पा ठक्कर साकेत प्रकाशन) मला दोन परस्परविरोधी मतप्रवाह दिसून आले.आपल्या सामूहिक भावनिक जीवनावर दुर्दैवाने घातलेला घाला एक प्रवाह रंगवत आहे,तर दुसरा त्याका काही आशादायक उपाय सुचवत आहे.


हा शोध आताच का घ्यायचा?


गेल्या शतकात वाईट बातम्यांचे जितके भरघोस पीक आले त्याहीपेक्षा अधिक प्रमाणात भावनेवर शास्त्रशुद्ध अभ्यास केले गेले.त्यापैकी सर्वांत अधिक प्रभावशाली आहे मेंदू कसा कार्य करतो याचा उलगडा.मेंदू प्रतिमा

सारख्या नूतन तंत्रज्ञानामुळे हे शक्य झाले.आतापर्यंतच्या इतिहासात जे गूढतेच्या आवरणाआड दडले होते ते त्यावरील आवरण दूर होऊन ते दृष्टीला पडले. आपण भावना अनुभवतो,विचार आणि कल्पना करतो,स्वप्न पाहतो तेव्हा समजायला अवघड असलेला हा मेंदू नावाचा मज्जापेशींचा गोळा नेमके कसे कार्य करतो हे कळू लागले.मेंदूबद्दल या जैवमज्जाविषयक ज्ञानाच्या महापुरामुळे आपल्यात्ता कधी नव्हे इतके स्पष्टपणे समजून घेता आले की,मेंदूतील भावनेशी निगडित केंद्र रागाला कशी चालना देतात किंवा अश्रू कसे निर्माण करतात.मेंदूतील अतिप्राचीन काळापासून अस्तित्वात असलेले भाग आपल्याला युद्ध किंवा प्रेम करायला कसे उद्दीपित करतात आणि हे सगळे भाग चांगल्या वा वाईट परिणामांसाठी परस्परांशी कसे जोडलेले आहेत.भावनांचे कार्य आणि त्यांच्या अपयशाविषयी मिळालेला या अभूतपूर्व स्पष्टतेमुळे आपत्त्या सामूहिक-भावनिक आणीबाणीवर नवनवे उपाय नजरेच्या टप्प्यात येऊ लागते आहेत. हे पुस्तक लिहिण्यासाठी मला शास्त्रीय माहितीच्या साठ्याच्या या पिकाची पूर्णपणे कापणी होईपर्यंत वाट पाहावी लागली.या पुस्तकातील मर्म इतक्या उशिराने प्राप्त होण्याचे कारण म्हणजे मानसिक जीवनातील भावनेच्या स्थानाकडे लक्ष देण्यात संशोधकांनी आश्चर्य वाटावे इतके दुर्लक्ष केले.


उर्वरित भाग पुढील लेखामध्ये..



१७/३/२४

जरा दमानं..! A little breath..!

झाड वाढायची गती किती असते हे मला खूप वर्ष माहीत नव्हतं.ज्या बीच जंगलाचं व्यवस्थापन मी बघतो,त्यात झाडांची उंची तीन ते सात फूट इतकीच आहे.पूर्वी मी यांच्या वयाचा अंदाज जास्तीत जास्त दहा वर्ष लावला असता. पण व्यावसायिक लागवडीच्या बाहेरील विश्वात, म्हणजे नैसर्गिक जंगलात,माझा अभ्यास सुरू झाला तसं झाडांच्या वाढीचं गुपित मला उमगू लागलं.बीच वृक्षाच्या वयाचा अंदाज लावण्याची एक सोपी युक्ती आहे.त्यांच्या फांद्यांवर छोट्या गाठी असतात त्या मोजायच्या.

सुरकुत्यांचा पुंजका असल्यासारख्या या गाठी दिसतात. नवीन कोंबाच्या खाली दरवर्षी एक गाठ येते आणि फांदीची लांबी वाढत गेली की गाठ मागे पडत जाते.

दरवर्षी हे होत असतं त्यामुळे गाठींची संख्या आणि झाडाच्या वयात परस्परसंबंध लावता येतो.जेव्हा फांदीचा घेर सुमारे एक दशमांश इंच होतो तेव्हा ती गाठ सालीच्या खाली दडून जाते.माझ्या जंगलात मला एक बीचचं झाड तरुण वाटत असे.त्याच्या एका आठ इंच लांबीच्या कोवळ्या डहाळीवर मला पंचवीस गाठी दिसल्या.या झाडाच्या बुंध्याचा घेर जेमतेम एक तृतीयांश इंच होता आणि त्यावरून त्याचं वय कळून येत नव्हतं. मी जेव्हा गाठींचा हिशोब लावून त्याच्या वयाचा अंदाज घेतला तेव्हा मला ते झाड किमान ऐंशी वर्षांचं असल्याचं जाणवलं. त्या वेळेस मला हे फारच धक्कादायक वाटलं होतं,पण पुरातन जंगलातून माझा अभ्यास सुरू झाला आणि आज मला कळतंय की यात काहीच आश्चर्य नाही.(द हिडन लाईफ ऑफ ट्रीज,पी ट र वो ह्ल ले बे न,अनुवाद - गुरुदास नूलकर,अरविंद घनश्याम पाटकर,मनोविकास प्रकाशन)तारुण्यात आलेल्या झाडांना झपाट्याने वाढण्याची घाई असते.एका ऋतूत ते दीड फुटापर्यंत सहज वाढू शकतात.पण त्यांच्या दुर्दैवाने त्यांची आईच त्यांना एवढं वाढू देत नाही.आपल्या स्वतःचं आच्छादन आणि जंगलातल्या इतर झाडांच्या छत्रीमुळे तिथल्या जमिनीवर जेमतेम तीन टक्के ऊन पडतं.त्यामुळे त्या रोपट्यांच्या वाढीला ऊन कमी पडतं.३ टक्के म्हणजे काहीच नाही! इतक्या सूर्यप्रकाशात ते बिचारं झाड जेमतेम जिवंत राहण्यापुरतं प्रकाश संश्लेषण करू शकतं.

आपला घेर आणि उंची वाढवायला त्याला ताकद शिल्लक राहत नाही. बरं,या अशा कडक संस्काराच्या विरोधात बंडही पुकारता येत नाही,कारण त्यासाठीही शक्ती नसते.तुम्ही म्हणाल,संस्कार? होय,आपल्या रोपट्यांची काळजी घेण्यासाठी झाडं शतकानुशतकांच्या एका अनुभवांतून तयार केलेल्या अध्यापन पद्धतीचा वापर करतात. 'अध्यापन' हा शब्द मी असाच नाही वापरला, ही खरोखरच 'बाळ' झाडांना शिकवण्यासाठी झाडांनी वापरली शिक्षणपद्धतीच आहे. झाडांच्या बाबतीत अध्यापन हा शब्द जंगल व्यवस्थापनातील कर्मचारी अनेक वर्षांपासून वापरत आहेत.


या पद्धतीत रोपट्यांना सूर्यप्रकाशापासून वंचित ठेवलं जातं.पण ते कशासाठी?आपलं पाल्य लवकरात लवकर स्वतंत्र व्हावं असं त्या आईबापांना वाटत नाही का? या प्रश्नाचे उत्तर झाडं 'नाही' म्हणूनच देतील.शास्त्रज्ञांना असं दिसून आलं की जी झाडं तारुण्यात संथ गतीने वाढतात ती दीर्घायुषी होतात.

झाडांच्या बाबतीत दीर्घायुष्याची व्याख्या वेगळी असल्याचा आपल्याला विसर पडला आहे,कारण लाकडासाठी झालेल्या व्यावसायिक लागवडीत ८० ते १२० वर्षांच्या वर झाडाची वाढ होऊ दिली जात नाही.नैसर्गिक परिस्थितीमध्ये प्रौढ झाडांचा घेर पेन्सिली इतका असतो आणि साधारण माणसाइतकी त्यांची उंची होते.संथ वाढीमुळे खोडातील पेशी इतक्या सूक्ष्म असतात की त्यामध्ये हवेसाठी सुद्धा जागा नसते.पण यामुळे झाडं लवचीक राहतात आणि वादळी वाऱ्यात तग धरू शकतात.आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांना भक्षकांपासून संरक्षण मिळतं कारण टणक खोडात सूक्ष्मजीव शिरू शकत नाहीत.अशी वाढ झालेल्या झाडांना इजा होण्याचीही भीती नसते,कारण जखमेच्या ठिकाणी सालाची वाढ होऊन तिथे कुजण्याची प्रक्रिया थांबवली जाते.आपल्या रोपट्यांना दीर्घायू प्राप्त होण्यासाठी संगोपनाची आवश्यकता असते.पण कधीकधी यात तरुण झाडांच्या सोशिकपणाची परीक्षाच असते.आधीच्या प्रकरणात आपण पाहिलं की, बीच आणि ओकचे दाणे मातृवृक्षाच्या पायाशी पडलेले असतात.सूझान सीमार्ड या शास्त्रज्ञाने झाडांमधील मातृत्वाचा अभ्यास केला आहे.त्या म्हणतात की मातृवृक्ष आपल्या पिल्लांवर नेहमीच वर्चस्व गाजवत असतो.ही झाडं आपला वारसा पुढल्या पिढीला सोपवून जाणार असतात आणि त्यासाठी तरुण झाडांवर आपला प्रभाव पाडण्याचं काम चालू असतं.मातृवृक्ष हा जंगलातला प्रभावशाली वृक्ष असतो,

आपल्या मुळांशी असलेल्या बुरशीच्या जाळ्यातून तो जंगलातील इतर सर्व झाडांशी जोडला गेलेला असतो.

मला सापडलेलं ते 'तरुण' बीच झाड ८० वर्ष आपल्या आईच्या छायेत उभं होतं आणि त्याची आई त्या जागेवर किमान दोनशे वर्ष उभी आहे.झाडांच्या दृष्टीने दोनशे वर्षांचा कालावधी म्हणजे अंदाजे माणसाची चाळिशी.

माझ्या जंगलातल्या या तरुण झाडांना विशाल वृक्ष होण्यासाठी कदाचित अजून दोनशे वर्षं तरी शांतपणे वाट पाहावी लागणार आहे.पण त्यांच्या आईकडून ही प्रतीक्षा सुसह्य केली जाते.त्या आपल्या पिल्लांना मुळांतून जोडून घेतात आणि तिथून त्यांना साखर आणि पोषणद्रव्यांचा पुरवठा चालू असतो.आईकडून आपल्या बछड्यांची शुश्रूषा चालू असते,असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही.


झाडाखाली उगवणाऱ्या रोपट्यांकडे नीट बघितलं तर तुम्हालाही कळेल की ही तरुण झाडं विशाल वृक्ष होण्याची वाट शांतपणे पाहत आहेत का वाढण्याची घाई करत आहेत? त्यासाठी एखाद्या बीच किंवा सिल्व्हर फरच्या फांद्यांकडे पहा.जर ते झाड उंचीपेक्षा जास्त रुंद असेल तर ते अजून प्रतीक्षेच्या टप्प्यात आहे.आपल्या वाढीला पुरेसा सूर्यप्रकाश मिळाला नसल्यामुळे ते थोडं पसरून प्रकाशाचा शोध घेत असतं. त्यासाठी आपल्या फांद्यांना बाजूच्या दिशेने पसरवून पानांना अतिसंवेदनशील बनवतं,ज्यामुळे जो काही थोडासा सूर्यप्रकाश त्यांना सापडेल तोही वापरात आणता येईल.अनेकदा तुम्हाला अशा झाडांचे मुख्य खोडही ओळखू येणार नाही,कारण ती सपाट छपराच्या बोंसाई झाडांसारखी खूप कमी उंचीची असतात.


त्या तरुणांच्या आयुष्यात एक दिवस असा येतो की मातृवृक्षाचं आयुष्य संपतं किंवा तो आजारी पडतो.

यौवनात असलेली ही झाडं याच क्षणाच्या प्रतीक्षेत असतात.अशी घटना उन्हाळ्यातल्या वादळात होऊ शकते.जोरदार पाऊस आला की त्यांचं ठिसूळ खोड आपलं वजन सहन करू शकत नाही आणि कोलमडायला सुरुवात होते.खाली पडताना काही तरुण मंडळी चिरडली जातात.पडलेल्या झाडामुळे जंगलाच्या आच्छादनात मोठं भगदाड पडतं आणि खालच्या बालवाडीला भरपूर सूर्यप्रकाश मिळू लागतो. आता ते मनसोक्तपणे प्रकाश संश्लेषण करू शकतात.त्यांच्या चयापचयाचा वेगही वाढतो आणि झाडाची तब्येत सुधारण्यास सुरुवात होते.ही अवस्था एक ते तीन वर्ष राहते आणि नंतर पुढची वाटचाल सुरू होते.आता बालवाडीतील सर्वांनाच जोमानं वाढायचं असतं.जे युवक थेट आकाशाच्या दिशेने वाढतात तेच स्पर्धेत टिकून राहतात.ज्यांना वाटतं की थोडं इकडे तिकडे पसरून वाढावं,ते शर्यतीमध्ये मागे पडत जातात. सरळ वर वाढ होत गेलेल्या झाडांकडून आता जंगलाच्या आच्छादनात पडलेले भगदाड पुन्हा बंद होऊ लागतं आणि आपल्या आईच्या काळात होती त्याहीपेक्षा घनदाट छाया तिथे पडते.स्पर्धेत मागे पडलेल्या युवकांचा आता वाढण्याचा मार्ग बंद होत जातो.काही वर्षांतच हार मानून ते वळून जाणार असतात.पण उंच वाढणाऱ्यांना काही कमी धोके नाहीत. भरपूर सूर्यप्रकाश मिळायला लागला की झाड आपलं साखरेचं उत्पादन वाढवतं आणि नवीन कोंबांना जास्त प्रमाणात साखर पोचते.पूर्वी सावलीमुळे कोंब टणक आणि कडवट असायचे, पण आता मात्र ते हरणांसाठी गोड चवदार खाऊ बनतात.त्यामुळे काही तरुण झाडं खाल्ली जातात आणि पुढच्या हिवाळ्यापर्यंत तरी हरणांना कॅलरीज मिळून जातात.पण आता जंगलात तरुण झाडं मुबलक असल्यामुळे येणाऱ्या काळात काही झाडं मोठी नक्की होऊ शकणार असतात.पण ज्या वेळेस एकदम सूर्यप्रकाश उपलब्ध होतो तेव्हा काही फुलणारी झाडंही आपलं नशीब आजमावण्याचा प्रयत्न करतात. त्यामध्ये हनीसकल  नावाची एक वेली आहे.आपली नाजूक वेल ती त्या वाढणाऱ्या झाडांच्या फांद्यांभोवती गुंडाळून घेते आणि वर जाऊ लागते.सूर्यप्रकाश मिळताच ती भरपूर फुलोरा धरते आणि काही वर्षांतच त्या नाजूक वेली पकड जीवघेणी बनते आणि झाडाला त्रासदायक ठरते.आता अशाच वाढत राहिलेल्या वेलीला अजून किती वेळ मिळेल हा यक्षप्रश्न असतो.मोठ्या वृक्षांची वाढ झपाट्याने होऊन जंगलाचे आच्छादन पुन्हा बंद झाले तर मात्र सूर्यप्रकाश न मिळाल्याने हनीसकल कोमेजून जाईल आणि काही दिवसांत मरेल.पण जर भगदाड खूप मोठं असेल तर हनीसकल झपाट्याने वाढेल आणि घेरलेल्या झाडाला मारून टाकेल.अशा वेळेस त्या मृत झाडाच्या खोडाच्या पिळदार लाकडापासून आपल्याला छान काठी करता येते.सर्व अडथळ्यांचा सामना करत जेव्हा काही झाडं उंच आणि टुमदार होतील,तेव्हा वीस वर्षांच्या आत असलेल्या तरुणांवर पुढचं संकट बेतणार असतं.कारण उंच वाढलेली झाडं पुढच्या वीस वर्षांत वठलेल्या मातृवृक्षाचे शेजारी स्वतःचा पसारा वाढवून आच्छादनात पडलेली खिंडार पुन्हा बंद करून टाकतात.आणि मग त्या अर्धवट वाढलेल्या तरुण बीच,फर आणि पाईन वृक्षांना पुन्हा एकदा मोठा वृक्ष वठण्याची प्रतीक्षा करावी लागते.याला काही दशकं लागू शकतात.पण त्या तरुण झाडांच्या नशिबाचे फासे अगोदरच पडलेले असतात.

या उंचीपर्यंत जिवंत राहिलेल्या झाडांना आता कोणी स्पर्धक नसतात.ते जंगलाचे राजकुमार किंवा राजकन्या असतात, जे भविष्यात जंगलातील सर्वोच्च स्थान पटकावणार असतात.


०७.०१.२४ या लेखमालेतील पुढील भाग..

१५/३/२४

असं जीवन पाणपिपुलीचं.! Such is the life of a water pipe.!

झिलानी म्हणजे पाणथळ जागा ओलसर जमिनींनी ती व्यापलेली असते.समोर नवेगाव बांधचे स्वयंभु जलाशय उपसागरासारखे पूर्वेकडे पसरलेले आहे.हिरव्या निळ्या डोंगरात अजून अंधार रेंगाळत आहे.शुक्राच्या चांदणीचं तळ्यात पडलेलं प्रतिबिंब मोठं लोभस वाटतंय. जलाशयाच्या लाटांवर अ‌द्भुत सावल्या पसरल्या आहेत.

त्या झुंजुमुंजु प्रकाशात सहासात धीवर जाळे पसरून कमरेएवढ्या पाण्यातून फेर धरून पुढं पुढं सरकत आहेत.

दोघं धीवर त्यांच्या विरुद्ध दिशेनं पाण्यावर काठी बडवीत माशांना जाळीकडे खेचत आहेत.पाण्यासारख्या पारदर्शी मासोळ्या उड्या घेत जाळ्याकडे जात आहेत. पूर्वेकडे तांबडं फुटत आहे.त्या पार्श्वभूमीवर धीवरांच्या सावळ्या आकृती स्फटिकाप्रमाणे वाटणारे जाळ्यांचे धागे-जाळीची टोकं एकत्रित आणण्याकरिता एकमेकांकडं हळूहळू सरकत असलेले धीवर आणि त्या पाण्यात पडलेल्या त्यांच्या तरल,असमान सावल्या दिसत आहेत.


पूर्व दिशा उजळू लागली तसे ते जलाशय प्रकाशमान होऊ लागले.आकाश निरभ्र होतं. तरी कुठं कुठं पर्वतांच्या शिखरावरील हिरव्या झाडीत पांढऱ्या ढगांचा एखादा पुंजका दिसत होता.तोदेखील आता सोनेरी भासत होता. बांधावरच्या घनदाट आंब्यातून येणाऱ्या 'क्वाक्, क्वाक्,

क्वाक्' या स्वरानं मी थबकलो.इकडं तिकडं पाहिलं.वाटलं हा आवाज तर टरकूचा पाणकोंबडीचा वाटतो.पण ते पाखरू न दिसताच,भुर्रकन झिलानीत गेल्याचा आवाज आला.झिलानीकाठच्या उंच कातळावर बसलो, की चोहोबाजूनं पाखरांचे अद्भुत स्वर कानावर यायचे.

कवड्याचे अरण्यगीत गुंजत असायचे. आकाशातून किर् किर् किर् किर् करीत राव्यांचा थवा उडत जायचा,

भारद्वाजाचे बुगु बुगु असायचे.बुलबुलांची गोड किलबिल,मैनेचा कलकलाट,नाचऱ्याची चिर् चिर्,सुंदर मनोलीची गोड चिव चिव असायची.


प्रभातकाळी आपल्यात आनंद स्फुरवू शकेल असा अन्य गायक पक्ष्यांशिवाय कोणी नाही.


या झिलानीत पाणपिपुलीची एक जोडी व त्यांची तीन पिलं राहात होती.माझी चाहूल लागताच पाणपिपुलीनं सिक्... सिक्... सिक्... सिक्...आवाजानं धोक्याची सूचना दिली. पाणपिपुल्या झिलानीकाठच्या देवभातात लपल्या.पिलं कमळाच्या पानापानांवरून किलबिलत त्यांच्यापाठोपाठ धावली.हा माणूस निरुपद्रवी दिसतो असं पाहून त्यांनी हळूहळू देवभातातून झिलानीत प्रवेश केला.दोघं कमळाच्या रुंद पानांवरून कुशलतेने हळुवार चालत होते ! पिलं मात्र त्यातल्या अंगाने पातळ असलेल्या पाणपिपुलीबरोबर,पानापानांवरून दुडदुडत असायची.

पिंगट सोनेरी रंगाचे ते तीन गोळे गुलाबी बोटांच्या पायावर पाचूच्या वर्णाच्या कमळाच्या पानावर उभे होते.सोनेरी डोकी गंभीरपणे वाकून चिमुकल्या चोचीनं पाण्यातील भक्ष्य वेचण्याचं अनुकरण करीत होती.


वाटायचं या गोजिरवाण्या पाखरांना स्पर्श करता आले असते तर! पण उंच कातळावरून पाण्यात पडलेल्या माझ्या प्रतिबिंबाच्या रूपानं मी त्यांच्यातच असे.पानावरून चालताना एखाद्याचा पाय पाण्यात पडे.

तरंगणाऱ्या पिलाला पाणपिपुलीतला नर चोचीच्या आधारानं सावरी.परंतु त्याला चोचीनं डोक्यावर मारून शिक्षा करी.जणू म्हणायचा असं पुन्हा करू नकोस.ती पिलं पूर्ववत त्याच्या मागोमाग चालायची.नर पिलांना एखाद्या पानामागच्या आळ्या दाखवून देई.पिलं त्यावर तुटून पडत,बर्फाप्रमाणं फक्त थोडा भाग पाण्याच्या पृष्ठावर तरंगणाऱ्या चिलाच्या डकवीडच्या फसव्या जाळीतून,

पायाची बोटं न अडकवू देता,कसं अलगद चालायचं याचं तो प्रात्यक्षिक करत पुढे जायचा...एखाद्या सावलीप्रमाणं धुक्याच्या तीन पुंजक्यांसारखी दिसणारी ती तेजस्वी पिलं त्याचं अनुकरण करीत.'आज्ञेचं पालन म्हणजेदीर्घायुष्य' हा धडा ते मोठ्या गंभीरपणे गिरवीत.एकदा झिलानीवर घिरट्या घालणाऱ्या पाणससाण्याला पाहून तो घाबरला.

'सिक्ऽऽ' आवाजाबरोबर ती पिलं त्याच्या पंखाखाली आली आणि तिघांना पंखात घेऊन तो जो उडाला तो पिटुंडीच्या जाळीत गडप झाला.पिलांचे लांब पाय लोंबताना दिसत होते. मोठं विचित्र व अद्भुत दृश्य होतं ते!


'पि-पि-पियु-पि-पि-पियु' सारख्या मधुर स्वरानं तो एखाद्या वेड्यासारखा त्या आवाजाच्या दिशेनं पिलांना तृणपाती टिपताना सोडून धाव घेई. झिलानीच्या मध्यावर ती उभी होती.अंगानं थोराड तपकिरी रंगाची.पंखावर सोनेरी वर्ख. झिलानीतली गवताची पानं तोडून ती कमळाच्या पानावर घरट्याचा पाया रचीत होती.तो विलक्षण वेगानं घरट्याजवळ पोहोचला.हिरव्यागार कमळाच्या पानांवर मोत्याचा चुरा विखुरावा तसे पाण्याचे थेंब दिसत होते.अशा या पाचूच्या पायघडीवरून तो हळूहळू मोठ्या ऐटीत मान वर करून तिच्याकडे जात होता.तो तिच्या नजीक जाताच तिनं पुन्हा गवताचं पातं खुडून कमळाच्या पानावर ठेवलं.तोही तिला साहाय्य करू लागला.त्यांचा विलक्षण अनुनय चालू असता,ती घरट्यात स्थानापन्न झाली.ती मोठी अद्भुत दिसे.सूर्याची किरणं त्या झिलानीवर पडली की त्या प्रकाशात ते झिलान मोठं रम्य वाटायचं.तिच्या पंखावर अवर्णनीय रंगाच्या छटा झळकावयाच्या.इतक्यात झिलानीच्या पलीकडून कुंभार कुकड्याचा मिस्किल पण खोकण्याचा आवाज आला.चिवचिवणारी ती शहाणी पिलं जागच्या जागी निःस्तब्ध थिजली.त्यांनी डोळे घट्ट मिटून घेतले.त्यांच्या पंखासारखाच जागच्या जागी रंग असलेल्या त्या पक्ष्याचा आवाज पाणपिपुलीला आवडत नसे. त्यानंच तर एकदा त्यांची तीन पिलं गट्ट केली होती.तो त्यांचा द्वेष करी.तो धावत पिलांजवळ आला.'चिक् ऽऽ' आवाजा

बरोबर 'साई-सुट्टोऽऽ'करीत ती पोरं तुरुतुरु पळत झुडपाबाहेर त्याच्याजवळ आली.


सूर्याच्या सोनेरी प्रकाशात कमळाच्या पानापानांवरून व चिलाच्या जाळ्यातून ती पिलं त्याच्याबरोबर पुन्हा फिरू लागली.झिलानीतल्या पाण्याचा गर्द हिरवा-निळा रंग,

त्यातून वर आलेल्या कमळाच्या पानांचं छत्र,पाण्याच्या बिंदूंनी युक्त असलेली कमळपत्रं व त्यातून वावरणारी ती पिलं एखाद्या पारदर्शक छबीसारखी दिसत.ती अंड्यांतून बाहेर आल्याला आठ-एक दिवस झाले असावेत.

कमळाच्या पानापानांवरून मादी एकटी काहीतरी वेचीत होती.एखाद्या पानावर उभे राहून पाण्यातील चिलाचा पुंजका बाहेर काढून तो उलट- सुलट तपासून त्यातील कृमि-कीटक व घोंगल्या ती वेची.मध्येच थोडा - वेळ पाण्यात उतरून अलगद तरंगत समोरच्या पानावरची अळी-कोश मान वेळावून लीलेनं टिपी.कमळाच्या पानांवर चरताना पाठमोरी उभी राहिली - की ती किती सुंदर दिसे! तिचं ते उभं राहणं म्हणजे पक्षी उभं राहण्याचं अलौकिक प्रतीक वाटे. कधी कधी अशा अवस्थेत पंखाची पिसं चोचीनं स्वच्छ करू लागली की तिच्या प्रत्यंगाच्या हालचालीत तिच्या रूबाबदार,कमनीय शरीरसौष्ठवाचा प्रत्यय येई.झिलानीवर सूर्याचा प्रकाश पडला.अर्धे झिलान प्रकाशात तर अर्धे डोंगराच्या सावलीत होते. पाणपिपुली प्रकाशातून फिरत होती.कमळाच्या पानावरून तिचं प्रतिबिंब पाण्यात पडे.गळा डोके छातीचा भाग मखमली काळा.पंख कांस्य वर्णाचे.त्यावर हिरव्या-तांबड्या-पाचू रंगाच्या अद्भुत छटा सूर्यप्रकाशात दृग्गोचर व्हायच्या. तिची पिवळी चोच उठून दिसायची.कित्येक वेळा त्या चोचीच्या हालचालीवरून हिरव्या कमळवनातून ती ओळखू यायची.नर पिलांसह देवभातात गेला तो जवळजवळ तासभर दिसलाच नाही.ती दोघं एकमेकांना साद घालून संबंध अतूट ठेवीत.ती 'चुक् चुक्' करीत पुन्हा घरट्याकडे आली.निरनिराळ्या मधुर स्वरांनी तिनं त्याला साद घातली.तिच्या गोड आवाजातल्या पि-पि-पि-पि पियूच्या स्वरांनी सारं देहभान विसरून तो तिच्याकडे धावत आला.ती घरट्यात एकटी उभी होती.तो तिच्या अंगलट उभा राहिला.या वेळी जाणवलं,की मादी खरोखरच नरापेक्षा अंगानं थोराड आहे.त्यानं तिच्या चोचीपाशी चोच नेली.एकाएकी तो उडून तिच्या पंखांवर आरूढ झाला.तिनं मान खाली घातली.त्याचं सर्वांग थरथरत होतं.या मीलनानंतर ती स्तब्धपणे घरट्यात बसून राहिली.नर जो उडाला तो झिलानीकाठच्या देवधानात गेला.तेथून पंख फडफडवीत लांब पाय लोंबकळवीत जडपणे कालवा ओलांडून पलीकडच्या झिलानीत उडून गेला.ती पिलं तिच्या जवळपास तृणांकुर कुरतडत होती.तिचं त्या पिलांवर लक्ष होतं.परंतु ती पिलांजवळ मात्र जात नसे.पिलं फार जवळ येऊ लागताच ती दुसऱ्या बाजूला उडून जायची.कुणीच जवळपास नाही हे पाहून पिलं बिचारी कमळाच्या पानाच्या सावलीत,शांत उभी राहिली.त्यांची हालचाल बंद झाली.पाणपिपुली नेहमीप्रमाणं पानांवरच्या घरट्यात आली.तिनं आज एक अंडंही घातलं. ओळीत तीन अंडी दिसत होती.सूर्याच्या प्रकाशात ती एखाद्या रत्नाप्रमाणे तेजस्वी व सुंदर वाटत होती.कालदेखील तिनं एक अंडं दिलं होतं.नरमादीच्या मधुर मीलनानंतर तिनं अंडी घालायला सुरुवात केली.ती घरट्यात स्थानापन्न होताच,मधुर आवाजात त्याला साद घालू लागली.परंतु आता तो पिलांना सोडून तिच्याकडे पूर्वीइतक्या आवेगानं धावत येत नसे.आला तो पिलांना सोबत घेऊन.त्यांना पाहताच ती घरटं सोडून निघून गेली.त्या दिवशी नर 'सी-सी-सी' करीत घरट्याकडे आला.त्यानं दुरून घरटं न्याहाळलं.त्यात सुंदर रंगाची तीन अंडी होती. लगेच तो घरट्यात स्थानापन्न झाला व अंडी उबवू लागला.इतक्यात पिलांचा चिवचिवाट ऐकताच,तो धावत त्यांच्याकडे गेला.ती एखाद्या तटस्थासारखी निर्विकारपणे झिलानीच्या एका टोकाला चरत होती.घरटं सोडण्यापूर्वी त्यानं अंडी गवताच्या पानानं झाकली.


तो घरट्यात असला की पिलं निमूटपणे कमळाच्या सावलीत उभी असायची. बांधाकाठची पडाळ फुलली होती.झिलानीतली तीन शुभ्र कमळं रोज विकसित होत होती. हिरवंनिळं झिलान कुमुदाच्या फुलांनी चांदण्याप्रमाणं नित्य फुलत होतं.सायंकाळी झिलानीवरच्या सूर्याच्या परावर्तित प्रकाशात

झुडपाच्या काडीवर बसलेला पांढरा-काळा किलकिला ओलेचिंब झालेले पंख झटकताना दिसे.निरभ्र,निळ्या उंच आकाशातून सात-आठ पाणकावळे तळ्याकडे उडत जाताना दिसले. पाऊस थांबला तसं पावश्याचं ओरडणं थांबलं, सकाळी हिरव्यागार गवतावर दवाचे थेंब दिसू लागले.इतक्यात चातकाची जोडी झिलानीतल्या एका कमळाच्या पानावर येऊन बसली ती एका पानावरून दुसऱ्या पानावर जाण्याचा जणू खेळ खेळत होती.

कमळाच्या पानावरील दवानं त्यांच्या लांब शेपट्या ओल्याचिंब झाल्या. पानावर ते मोठ्या रूबाबात बसले की त्यांची लांब शेपटी पानाबाहेर येई.डोक्यावर काळी शेंडी,पांढरा गळा-पोट,काळ्या पंखांवर कवडीएवढे पांढरे ठिपके,ते पानाच्या मध्यावर खोलगट भागात साठलेल्या दवाच्या पाण्यात आपले पंख फडफडून आंघोळ करीत.तीन-चार दवाचे थेंब चोचीने हळूवार टिपीत.

कमळाच्या एका दांड्यावरून दुसऱ्या पानावर बसत.

त्यांच्या हालचालीनं अंड्यावर बसलेली मादी घरटं सोडून निघून गेली.ती सारखी 'सिक्-सिक्-सिक् सिक्' करीत काहीतरी कुरतडीत होती.मात्र तिचं सारं लक्ष घरट्याकडे होतं.आज दोन्ही पाणपिपुले घरट्याजवळ दिसत होते.ते एकमेकांशी लगट करीत होते.शेवटी एक पाणपिपुली घरट्यातील अंड्यावर बसली.मोठा अजब प्रकार होता. वाटलं,तो तिला किंवा ती त्याला अंड्यावर बसण्यास भाग पाडीत होती की काय? सकाळपासून ती तीनदा अंड्यावर बसली होती आणि तीनदा तिनं घरटं सोडलं होतं.घरट्यात आली की ती दोन्ही पायांमध्ये अंडी ठेवून उभी राही.

एकदा खाली वर मान करी.सूर्याकडे पाठ करून अंडी उबवू लागे.तो दूर झिलानीकाठी आपली पिसं चोचीनं व पायाच्या बोटांनी साफ करी.पिलं जवळच तृणपाती टोकरीत होती.दवाचं पाणी पिणाऱ्या चातकाकडे ते जरी दुर्लक्ष करीत तरी आपल्या अन्नाशी स्पर्धा करणाऱ्या पक्ष्यांना नर आपल्या जवळपास फिरकू देत नसे. त्या दिवशी पाण्यात स्तब्ध उभ्या असलेल्या ढोकरीला तिनं झिलानीतून हुसकून लावलं. झिलानीकाठच्या देवधानातील पाऊलवाटेनं एकदा टरकू,भुंग्यासारखी काळीभोर सहा-सात इवलीशी पिलं घेऊन झिलानीकडे येत होता तर त्यानं त्यांना अर्ध्या वाटेतूनच परतवून लावलं.त्या झिलानीवर त्याचं एकछत्री मुक्त साम्राज्य (जंगलाचं देणं,मारुती चितमपल्ली) होतं.एखाद्या मोठ्या सावजावर प्रथम तो 'क्वाक्' करून उंच उडी घेऊन हल्ला करी.तशी पिलं धावत येऊन त्या सावजावर तुटून पडत.


उन्हाची तिरपी किरणं तिच्या घरट्यावर पडली होती.ती हळूहळू घरट्याकडे येत होती.घरट्यात उभी राहिली होती.चोचीनं तिनं अंडी पंखाखाली सारली.सूर्याकडे तोंड करून तिनं अंडी उबविण्यास सुरुवात केली.किनाऱ्यावर टिटवीचा आवाज येत होता.तिनं आपली मान उंच सरळ केली.डोक्यावरील दोन पांढऱ्या रेघा नागिणीच्या फणीवरील आकड्यासारख्या दिसत.तिच्या पिवळ्या चंचुपुटाची हालचाल नागिणीच्या जिभेसारखी वाटायची. गुप्तधनावर बसलेली जणू नागीणच ती ! पिलं दिसामासी वाढत होती. त्यांचा रंग बदलत होता.खालचा भाग पिंगट तर वरचे अंग तपकिरी रंगाचे दिसू लागले.ढांगुळ्या पायांवर आता मुलायम पिसं दिसू लागली.पंजे कोळ्याच्या पायाप्रमाणं दिसू लागले.तो त्यांना रोज नवीन जागी नेई.त्यांना रोज नवीन पदार्थ खायला मिळत.ती शहाणी होत होती.त्यांचं सौंदर्य नित्य विकसित होत होतं.

१३/३/२४

भारतीय संस्कृतीच्या जागतिक पाऊलखुला Global footprint of Indian culture

सोमनाथ मंदिराच्या बाणस्तंभावर कोरलेला श्लोक असा आहे.


आसमुद्रांत दक्षिण ध्रुव पर्यंत अबाधित ज्योतीर्मार्ग...!


(या मंदिरापासून दक्षिण ध्रुवापर्यंतच्या रस्त्यात एकही अडथळा [जमीन] नाही.येथून ज्योतीचा मार्ग [प्रकाश] सरळ तिथपर्यंत पोहोचू शकेल.)


अर्थात दीड-दोन हजार वर्षांपूर्वी आपल्या भारतीयांना जर दक्षिण ध्रुव माहीत असेल तर त्यांनी नक्कीच पृथ्वी

प्रदक्षिणा केलेली असणार.म्हणजे जगाच्या पाठीवर भारतीयांच्या पाऊलखुणा निश्चितच असतील.आजपासून एक हजार वर्षांपूर्वीपर्यंत जागतिक व्यापारात भारत २७% ते ३०% हिस्सा घेऊन पहिल्या क्रमांकावर होता.आता व्यापाराला जाणारा माणूस त्या त्या क्षेत्रात आपल्या अगदी लहानशा का होईना, वसाहती निर्माण करतोच.जसं भारतात राजस्थानच्या मारवाडी समुदायांनी अगदी बांगलादेशपासून ते आसाम,दक्षिण भारतापर्यंत अनेक ठिकाणी लहान लहानशा वसाहती निर्माण केल्या.मात्र अशा प्राचीन भारतीयांच्या जागतिक पाउलखुणाबद्दल फारसं डॉक्युमेंटेशन कुठं आढळत नाही.अंबेजोगाईच्या डॉ.शरद हेबाळकरांनी एक छानसं पुस्तक लिहिलंय - 'भारतीय संस्कृतीचा विश्वसंचार'.साधारण १९८० मध्ये लिहिल्या गेलेल्या ह्या पुस्तकानंतर अनेक ठिकाणी उत्खनन होऊन बरीच नवीन माहिती मिळाली आहे.

त्यामुळे ह्या विषयावर बरेच संशोधन होणे आवश्यक आहे. डॉ.रघुवीर यांनी जगातील भारतीय लोकांच्या उपस्थितीविषयी भरपूर लेखन केले आहे.विशेषतः

मंगोलियातील हिंदू संस्कृतीचा प्रभाव हा त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय होता.डॉ.चमनलाल यांचे 'हिंदू अमेरिका' हे पुस्तक देखील प्रसिद्ध आहे.


या सर्व पुस्तकांमधून हिंदू अथवा भारतीय संस्कृतीचा जगभर झालेला प्रवास दिलेला आहे. पण इतिहास संशोधकाला पुरावे लागतात.तसे पुरावे गोळा करण्याचे काम गेल्या वीस / पंचवीस वर्षांत फारसे झालेले नाही.

डॉ.विष्णू श्रीधर (हरिभाऊ) वाकणकर हे नावाजलेले पुरातत्ववेत्ता.मध्यप्रदेशातील आदिम खुणा असलेल्या 'भीमबेटका' गुहांचा शोध यांनीच लावला आहे.डॉ.शरद हेबाळकरांच्या पुस्तकाला प्रस्तावना लिहिताना हरिभाऊंनी त्यांच्या १९८४ सालच्या अमेरिका आणि मेक्सिको प्रवासाचा अनुभव दिलेला आहे.तो सांगताना त्यांनी अमेरिकेच्या सन डियागोच्या पुरातत्व संग्रहालयाचे अध्यक्ष बेरीफेल यांचा उल्लेख केला आहे.या बेरीफेल महोदयांनी मेक्सिकोच्या उत्तर पश्चिमेला असणाऱ्या युकाटन प्रांतात तावसुको नावाच्या जागी,माया संस्कृतीच्या मंदिरांमधे मिळालेल्या 'वासुलून' नावाच्या भारतीय महानाविकाच्या भाषा आणि लिपीमधे लिहिलेल्या मजकुराचा उल्लेख केला आहे. आणि या पुराव्यावरून बेरीफेल यांनी निर्विवादपणे सांगितले आहे की,आठव्या / नवव्या शतकात तिथे भारतीय जात होते. दुर्दैवाने ह्या 'वासुलून' महानाविकाच्या शिलालेखाचा फोटो कुठेच उपलब्ध नाही. म्हणजे तो शिलालेख तिथल्या संग्रहालयात नक्कीच असेल,पण कोणी तेथे जाऊन त्याचा फोटो प्रकाशित करण्याचा प्रयत्न केलेला नाही. एखादे प्रतिपादन करायला ठाम पुरावे लागतात. ते गोळा करण्याचं मोठं काम करण्याची फार आवश्यकता आहे.


मात्र आता असे पुरावे मिळताहेत.भारतीय / हिंदू / वैदिक,अगदी कुठलंही नाव आपण दिलं तरी आपल्या प्राचीन संस्कृतीचं अस्तित्व जगभर सापडतंय.भारताच्या पूर्वेला तर आपल्या संस्कृतीचे अंश आजही बऱ्याच प्रमाणात बघायला मिळतात.पण भारताच्या पश्चिमेला विशेषतः इजिप्त,युरोप इथेही दोन - तीन हजार वर्षांपूर्वीचे वैदिक संस्कृतीचे अस्तित्व उठून दिसते.मध्यंतरी Out of India Theory (OIT), मांडली गेली होती.या सिद्धांताप्रमाणे, भारतातील काही सुसंस्कृत पंथ/जमाती/ समूह, वेगवेगळ्या कारणांनी युरोपात,आफ्रिकेत स्थलांतरित झाले.यात एक प्रमुख नाव आहे, केल्टिक (Celtic) लोकांचं.


केल्टिक ही युरोपात बोलली जाणारी भाषा आहे. ही भाषा (किंवा भाषासमूह) बोलणारे लोक हे ख्रिस्तपूर्व एक हजार वर्षांपूर्वी युरोपात होते असं संशोधनाने सिद्ध झाले आहे.ख्रिस्तपूर्व सातव्या आणि आठव्या शतकांतले त्यांच्या अस्तित्वाचे बरेच पुरावेही मिळाले आहेत.त्या काळात रोमन त्यांना 'गल्ली' म्हणत,तर ग्रीक 'केल्टोई' म्हणत.ह्या दोनही शब्दांचा अर्थ बार्बेरिक असा होतो.

साधारण ख्रिस्तपूर्व चौथ्या शतकात हे केल्टिक लोक ब्रिटनच्या आजूबाजूला आले आणि स्थिरावले.आजही आयर्लंड,स्कॉटलंड,वेल्स,कॉर्नवॉल,ब्रिटन या भागात चार प्रकारच्या केल्टिक भाषा,ह्या मातृभाषा म्हणून बोलल्या जातात.एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वी ह्या केल्ट मंडळींचे मूळ हे फ्रांस आणि जर्मनीच्या आसपास मानले गेले होते.मात्र नंतर त्यांच्या मूळ जागेबद्दल अनेक सिद्धांत मांडले गेले.दुईस बेलेनोईस आतेग्नातोस (Druuis Belenois Ategnatos) ह्या पुरातत्त्व संशोधकाने केल्टिक ही जमात हिंदू / वैदिक जमातींपैकी एक असल्याचे प्रतिपादन केले आहे. त्याच्या सिद्धांताप्रमाणे ह्या केल्टिक लोकांचे मूळ हे 'उत्तर कुरु' ह्या राज्यात होते. उत्तर कुरु म्हणजे हिमालयाचा उत्तर पश्चिम भाग. अनेक इतिहास संशोधकांच्या मते हिमालयाच्या उत्तरेतही,पूर्वी वैदिक संस्कृतीच होती.

विशेषतः डावीकडे किर्गीस्तानपासून ते उजवीकडील तिबेट- पर्यंतच्या फार मोठ्या प्रदेशात वैदिक संस्कृती नांदत होती.पुढे बौद्ध धर्माच्या प्रभावामुळे या जमातीतील काही लोकांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला.ते तिथेच राहिले आणि ज्यांनी सनातन वैदिक धर्माची कास सोडली नाही,ते युरोपच्या दिशेने स्थलांतरित झाले.तेच हे केल्टिक लोक..!! आजही त्यांच्या नैमित्तिक गोष्टींमधील अनेक प्रथा आणि पद्धती वैदिक प्रकाराच्या जवळ जाणाऱ्या आहेत.अनेक युरोपियन इतिहासतज्ज्ञांनी ह्या केल्टिक लोकांना 'युरोपातील ब्राम्हण' हे नाव दिले आहे.कारण वैदिक धर्माप्रमाणे चालणाऱ्या अनेक प्रथा,ही मंडळी आजही पाळतात.पीटर बेरेस्फोर्ड एलिस (Peter Berresford Ellis) ह्या इतिहासतज्ज्ञाने देखील केल्टिक समूह म्हणजे प्राचीन वैदिक संस्कृती मानणारा हिंदूंचाच समूह आहे,जो पुढे कालांतराने युरोपात स्थलांतरित झाला,असे म्हटले आहे.


श्री.श्रीकांत तलगेरी ह्या इतिहासविषयक अभ्यासकांचे या विषयावर विपुल लेखन उपलब्ध आहे.तलगेरींच्या सिद्धांताप्रमाणे ऋग्वेदपूर्वीच्या काळापासून अनेक हिंदू समूहांनी अफगाणिस्तान आणि युरोपच्या दिशेला स्थलांतर करायला सुरुवात केली होती.त्यामुळे अनेक युरोपियन संस्कृतींच्या मुळाशी हिंदू संस्कृतीच्या लहान-मोठ्या पाऊलखुणा आढळतात.तलगेरींच्या मते ऋग्वेद लिहिण्याचा काळ हा दोनशे ते तीनशे वर्षांचा आहे.'द ऋग्वेद - ए हिस्टॉरिकल ॲनालिसिस' या आपल्या ग्रंथात ते  ऋग्वेदात वर्णन केलेल्या राजवंशांचा मागोवा घेतात.त्यांच्या मताप्रमाणे भारताबाहेर स्थलांतरित झालेले इतर हिंदू समूह आहेत.


१.पार्थस किंवा पार्थवस (ऋग्वेद ७ - ८३ - १) 

 पार्थियन्स


२.पार्सस किंवा पर्सवास (ऋग्वेद ७ - ८३ - १)

 पर्शियन (पारसी)


३.पख्तास (ऋग्वेद ७ - १८ - ७) पख्तून


४.भालानास (ऋग्वेद ७ - १८ - ७) बलुची


५.शिवस (ऋग्वेद ७ - १८ - ७) किवास


कोनराड ईस्ट (Koenraad Eist) ह्या संशोधकानेही श्रीकांत तलगेरींचे मत उचलून धरलेले आहे.


असाच एक समूह आहे, जो इराक,सिरीया, जर्मनी,आर्मेनिया,रशिया येथे राहतो.हा 'येझिदी' समूह मुस्लीम नाही.ख्रिश्चनही नाही.पारशी धर्म मानणारा पण नाही.यांचा स्वतःचा 'येझिदी पंथ' आहे.मात्र हा पंथ,हिंदू धर्माच्या अगदी जवळ जाणारा आहे.अनेक संशोधकांनी ह्या 'येझिदी' पंथाला,हिंदूंचा एक पश्चिम आशियात हरवलेला पंथ म्हटले आहे.

यांच्या नेमक्या संख्येबद्दल वेगवेगळे मतप्रवाह आहेत.अनेक लोकांच्या मते ह्या पंथाची संख्या १५ लाख आहे.हा पंथ मानणारे लोक प्रामुख्याने इराक आणि सिरीया इथे राहतात.


गंमत म्हणजे,पाकिस्तानचे एक पोर्टल आहे.'पाकिस्तान डिफेन्स' नावाचे (www.defence.pk). ह्या पोर्टलवर त्यांनी एक सविस्तर लेख दिलाय,ज्याचं शीर्षक आहे - "The Yazidi Culture is Very Similar to a Hindu sect'.या लेखात दिलेल्या माहितीप्रमाणे जगात फक्त ७ लाख येझिदी शिल्लक राहिलेले आहेत आणि ते मुख्यतः इराकजवळच्या कुर्दिश भागात राहताहेत.या लेखात अनेक पुरावे देऊन हे सांगण्याचा प्रयत्न केला गेलाय की,येझिदी म्हणजे प्राचीन हिंदूंचा एक स्थलांतरित झालेला समूह आहे.या येझिदीची प्रार्थनास्थळे ही अगदी हिंदूंच्या देवळासारखी दिसतात.त्यांच्या मंदिरांवर नागाचे चित्र चितारलेले असते.सर्वांत महत्त्वाचे म्हणजे येझिदी लोकांची जी पवित्र खूण आहे,त्यात पिसारा फुलवलेला मोर प्रामुख्याने आहे.गंमत म्हणजे इराक,सिरीया वगैरे ठिकाणी कुठेही मोर हा प्राणीच आढळत नाही.आणि ह्या मोराचं साम्य,तामिळ भगवान सुब्रमण्यम यांच्या परंपरागत चित्राशी / प्रतिमेशी आहे.पिवळा सूर्य हा येझिदींचं प्रतीक आहे.या सूर्याची २१ किरणं आहेत.२१ ही संख्या हिंदू धर्मात पवित्र मानली जाते.आपल्यासारख्याच समया,

तसंच दीप प्रज्वलन, स्त्रियांच्या कपाळावर पवित्रतेची बिंदी,तीच पुनर्जन्माची श्रद्धा... हिंदूंच्या अनेक चाली-रीती येथे ठळकपणाने उठून दिसतात.आपल्या हिंदूंसारखेच तेही हात जोडून त्यांच्या देवाला नमस्कार करतात.

आपल्यासारखेच तेही यज्ञ करतात.आपल्यासारखीच पूजा करतात, आरतीची ताटं तयार करतात.अशी कितीतरी साम्यस्थळे ह्या दोन संस्कृतीत दिसून येतात.


याचा अर्थ स्पष्ट आहे.अत्यंत संपन्न अन् वैभवशाली अशा हिंदू / वैदिक संस्कृतीचे पाईक, हे समूह,

ख्रिस्तपूर्व दोन हजार / तीन हजार वर्षांआधी निरनिराळ्या कारणांनी स्थलांतर करून जगातल्या वेगवेगळ्या भागात गेले. काहींनी आजूबाजूच्या परिस्थितीशी / वातावरणाशी मिळतंजुळतं घेतलं अन् थोडीफार तरी संस्कृती टिकविली,तर काहींनी थोडी जास्त..! त्यांच्या ह्या प्रवासाच्या पाऊलखुणा,शोधल्या तर सापडतात.रशियाच्या दक्षिणेला युक्रेन हा देश आहे,जो पूर्वी रशियाचाच एक भाग होता.या युक्रेनमधे,काळ्या समुद्रकिनारी एक मोठं शहर आहे,ओदेसा (ओडीसा..?) नावाचं.याचं इंग्रजीत स्पेलिंग आहे - Odessa. या शहरात पुष्किन संग्रहालय आहे. या संग्रहालयात भारतीय देवतांच्या तीन प्रतिमा ठेवलेल्या आहेत, ज्या अगदी जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रेसारख्याच दिसतात...! या ओदेसा शहरात,काही वर्षांपूर्वी,अगदी प्राचीन आणि मोडकळीस आलेल्या,हजार वर्षं जुन्या स्मारकाच्या जागी खोदकाम करताना ह्या प्रतिमा सापडल्या.धातूच्या ह्या प्रतिमा,हुबेहूब जगन्नाथपुरीच्या देवांसारख्या आहेत..!


भारतीयांच्या विश्वव्यापी पाऊलखुणा ठसठशीतपणे बघायच्या असतील तर बेरेनाईक (Berenike) प्रकल्पाचा अभ्यास करणं आवश्यक होऊन जातं.

बेरेनाईक हे इजिप्तमधले अतिशय प्राचीन असे बंदर आहे.सुवेझ कालव्याच्या दक्षिणेला ८०० किलोमीटरवर असलेले हे बंदर लाल समुद्राच्या पश्चिम तटावर आहे.हा बेरेनाईक प्रकल्प,पुरातत्त्व उत्खनन प्रकल्पांपैकी एक मोठा प्रकल्प आहे.१९९४ मध्ये सुरू झालेला हा प्रकल्प,अजूनही चालूच आहे. नेदरलंड फाउंडेशन फॉर साइंटिफिक रिसर्च, नॅशनल जिओग्राफी,नेदरलंडचे विदेश मंत्रालय, युनिव्हर्सिटी ऑफ डेलावेर आणि अमेरिकन फिलॉसॉफिकल सोसायटी यांनी संयुक्तपणे या प्रकल्पाला पैसा पुरवला आहे.


ख्रिस्तपूर्व २७५ वर्षांपूर्वी,टोलेमी - द्वितीय (Ptolemy II) ह्या इजिप्तच्या राजाने लाल समुद्राच्या किनाऱ्यावर हे बंदर बांधले आणि त्याला आपल्या आईचे नाव दिले - बेरेनाईक.हे बेरेनाईक स्वाभाविक बंदर तर होतेच,पण हवामानाच्या दृष्टीनेही व्यापारी मालासाठी अनुकूल होते.या बंदरापासून,उंटांच्या द्वारे मालाचे दळणवळण इजिप्तच्या आणि शेजारील देशांच्या इतर भागात सहजतेने होत होते.भारताच्या दृष्टीने ह्या प्रकल्पाचे महत्त्व म्हणजे, येथे भारतीयांच्या प्राचीन वैश्विक व्यापाराचे खणखणीत पुरावे मिळाले आहेत.या उत्खननात त्यांना सुमारे ८ किलो काळी मिरी सापडली,जी निर्विवादपणे दक्षिण भारतातच उगवली जायची.याशिवाय भारतातून निर्यात झालेले काही कपडे,चटया,आणि पिशव्या मिळाल्या.कार्बन डेटिंगमधे हे सर्व सामान इसवी सन ३० ते इसवी सन ७० चे निघाले.


या उत्खननात संशोधकांना एक रोमन पेटी मिळाली,ज्यात भारताच्या 'बाटिक प्रिंट'चे कपडे आणि भारतीय शैलीतले चित्र काढलेले कपडे मिळाले. (भारतीय ज्ञानाचा खजिना,प्रशांत पोळ,स्नेहल प्रकाशन )


या सर्व उत्खननातून संशोधकांनी हा निष्कर्ष काढला की,भारताचा हा समुद्री 'स्पाईस रूट', लोकप्रिय आणि प्रचलित असलेल्या 'सिल्क रूट' पेक्षाही आधीचा होता.

भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरून बेरेनाईकच्या बंदरापर्यंत समुद्री मार्गाने भारताच्या जहाजांची ये-जा होत होती. पुढे इसवी सन ५०० च्या नंतर बेरेनाईकमधे प्लेगची साथ उद्भवल्याने ह्या बंदराचा व्यापार जवळजवळ बंद झाला.


एकुणात काय तर ख्रिस्तपूर्व दोन / तीन हजार वर्षांपूर्वी,म्हणजे आजपासून चार / पाच हजार वर्षांपूर्वी हिंदू आपल्या समृद्ध आणि संपन्न संस्कृतीला घेऊन जगप्रवास करत होते.व्यापार करत होते.ज्ञान-विज्ञानाचा वसा जगाला देत होते.जगातील अनेक ठिकाणी पहिल्यांदा पोहोचले ते हिंदू नाविक/ व्यापारी.


दुर्दैवानं या सर्वांचा इतिहास आपल्याला जपता आला नाही.म्हणूनच कोलंबस,वॉस्को-डी-गामा, मार्को पोलो,

ह्यूएनत्संग सारखी नावं जगप्रसिद्ध झाली अन् आपल्या पराक्रमी नाविकांची / व्यापाऱ्यांची / धाडसी राजांची नावं इतिहासाच्या काळोखात बुडून गेली..!


मग कधीतरी बेरेनाईकसारख्या उत्खनन प्रकल्पाचे गवाक्ष उघडते.प्रकाशाची तिरीप येते आणि त्या लहानशा प्रकाशकिरणात प्राचीन भारताचा वैभवशाली इतिहास झळाळून उठतो..!!