* विजय गायकवाड | Vijay Gaikawad

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

१०/५/२४

चल अकेला चल - let's go alone

श्रीरामपूर,नौखाली,नव वर्षदिन १९४७.हा देखील एक नव-वर्ष-दिनच! ही घटना लंडनच्या डाऊनिंग स्ट्रीटपासून सहा हजार मैलांवर असलेल्या गंगा नदीच्या खोऱ्यातील एका छोट्या खेड्यात पहायला मिळत होती.एका शेतकऱ्याच्या झोपडीतील शेणाने सारवलेल्या जमिनीवर एक वयोवृद्ध गृहस्थ ऐसपैस पडलेला आढळत होता.वेळ नेमकी मध्यान्हीची होती. बरोबर बाराच्या ठोक्याला त्या व्यक्तीने आपल्या साहाय्यकाकडून एक भिजून चिंब झालेली पोत्याची पिशवी मागून घेतली.पिशवीच्या छिद्रातून आत भरलेल्या चिखलाचे थेंब गळताना दिसत होते.त्या माणसाने ती पिशवी अतिशय काळजीपूर्वक आपल्या पोटावर थापटून ठेवली. त्यानंतर तशीच आणखी एक किंचित लहान दुसरी पिशवी त्याने आपल्या तुळतुळीत टकलावर थापून घेतली.हा सारा उपचार त्या माणसाच्या दिनचर्येचा नित्याचा भाग होता. त्याच्या निसर्गोपचाराचा हा परिपाठ होता.जमिनीवर पसरलेला तो माणूस दिसायला अगदी किरकोळ,बारकेला होता.पण म्हणून त्याच्या शक्तीचा अजमास घेणे वेडेपणाचे ठरणार होते. सत्त्याहत्तर वर्षांचा तो बलाढ्य ब्रिटिश साम्राज्य

शाहीला खिळखिळी करण्यास कारणीभूत होत होता हे कळताच थक्क व्हायला होत होते.त्याने दिलेल्या धक्क्यांनीच तर ब्रिटिश सरकारला जाग आली होती.त्याने उभ्या केलेल्या चळवळीचा परिपाक म्हणूनच व्हिक्टोरिया राणीचा पणतू लंडनहून भारताच्या स्वातंत्र्याची सनद घेऊन भारतात प्रवेश करणार होता. जगाला त्याची ओळख होती.मोहनदास करमचंद गांधी या नावाने ! मात्र सर्व भारतवासी त्याला 'महात्मा गांधी' म्हणूनच संबोधताना दिसत! म.गांधीची प्रतिमा रूढार्थाने 'क्रांतिकारकां'ची नव्हती.तो त्यांचा साचाच नव्हता.तरी जगाच्या इतिहासात लढल्या गेलेल्या एका अभूतपूर्व स्वातंत्र्यसंग्रामाचे ते उद्‌गाते होते यात शंका नाही.

त्यांच्यापाशी सेनानीला लागणारे भव्य व्यक्तिमत्व बिलकूल नव्हते.दिसायला अगदी लहानगे.उंची जेमतेम पाच फुटांची.वजन एकशे चौदा पौंडाच्या जवळपास.

हातपाय कंबरेच्या मानाने ऐसपैस.अवयवात प्रमाणबद्धता अशी कमीच म्हणा.बरे,चेहरा तरी देखणा असावा ! तोही तुलनेने कुरूपातच जमा. डोक्याचा आकार नको त्याहून मोठा,कान काटकोनात चिकटवल्यासारखे.साखर-

दाणीच्या मुठीसारखे नाक.पुष्कळच बसके,नाकपुड्यांना टोके आलेली.त्याखाली पांढऱ्याशुभ्र मिशांचा झुपका.

दातांचे बोळके झालेले.त्यामुळे ओठांचा आकार संपूर्णपणे दृश्यमान.थोडक्यात,महात्मा गांधीचा चेहरा दर्शनसुख देणाऱ्यापैकी नव्हता. 


नाकाडोळयांनी नीटस नसणाऱ्या त्या चेहऱ्यावरचे तेज मात्र आगळे होते.रूपसौंदर्यापेक्षा भावसौंदर्यात सरस भासणाऱ्या त्या मुखावरचे भाव त्यांच्या प्रवाही विचार शक्तीचा व विनोदबुद्धीचा चटकन प्रत्यक्ष आणून देत व त्यातील विलोभनीय चैतन्य साकार करत. 


आपल्या अहिंसेच्या तत्त्वज्ञानाने गांधींनी हिंसाचारात लडबडलेल्या शतकापुढे एक नवा पर्याय ठेवला होता.

त्याच्या प्रभावाखाली आणलेल्या भारतीय जनतेला त्यांनी इंग्रजाविरुद्ध उभे केले होते.


त्यांची शस्त्रे होती प्रार्थना व तिरस्कारदर्शक मौनवत,त्यांना मशिनगन्स,दहशतवाद्यांचे बॉम्ब नको होते. त्यांना सशस्त्र उकाव अभिप्रेत नव्हता.त्यांना उभारायचे होते नीतीतत्त्वावर आधारलेले धर्मयुद्ध


हातवारे करून गर्जना करणा-या जुलमी हुकुमशहांच्या पिसाट अंमलाखाली भांबावून गेलेल्या पश्चिम युरोपमधील जनतेला भारतातील घटनांची अपूर्वाई वाटावी इतके त्याचे कार्य महान होते.हिंदुस्थानची प्रचंड लोकसंख्या आपल्यामागे खेचून घेताना गांधीनी आपला आवाज किंचितही चढवला नव्हता.अगदी मोजक्या शब्दांनी व कृतींनी.त्यांनी लोकांना प्रोत्साहित केलेले होते.आपल्या अनुयायांसाठी सत्ता व संपत्ती यांची आमिषे लावलेले गळ त्यांच्यापाशी नव्हते.उलट त्यांनी एक ताकीद देऊन ठेवलेली ज्यांना माझ्यामागून यायचे असेल त्यांनी उघड्या जमिनीवर झोपण्याची,जाडेभरडे कपडे घालण्याची,

मिळेल ते अन्न खाण्याची, पहाटे उठण्याची आणि विशेष म्हणजे शौचकूप साफ करण्याची तयारी ठेवून यावे.

गांधीच्या अनुयायांचा पोषाख साधा,स्वहस्ते कातलेल्या खादीच्या कापडाचा होता.पण त्यामुळे त्याचा परिणाम कमी झाला असे आढळत नव्हते.सहजासहजी उठून दिसणारा हा वेष सर्वांना एकत्र आणणारा होता.युरोपीय देशातील हुकुमशहांनी घालून दिलेल्या वेषांशी त्याची तुलना होऊ शकत होती.


प्रचाराच्या आधुनिक तंत्राचा गांधीनी वापर केला नाही.त्यांचा बराचसा पत्र- व्यवहार त्यांच्याच अक्षरात असावयाचा.आपल्या कार्यकत्यांशी संवाद साधण्यात त्यांना कमीपणा वाटत नसे. निरनिराळया माध्यमातून ते लोकांशी संपर्क साधत.जनतेत सक्तीची बांधिलकी निर्माण करण्याचा मार्ग त्यांनी चोखाळला नाही.तरीही त्यांचा आवाज देशाच्या कानाकोपऱ्यात जाऊन पोचत होता.आपल्या एखाद्या छोटया कृत्याने ते काश्मीर- पासून कन्याकुमारीपर्यंत कोठेही सह‌जासह‌जी भिडत असत.

शतकानुशतक' 'नेमिचि येणाऱ्या'दुष्काळाचा अनुभव असणाऱ्या साध्यासुध्या भारतीय जनतेच्या अंत:करणास भिडण्यासाठी त्यांनी एक नवे अस्त्र शोधून काढले होते.

'प्राणांतिक उपोषणा'साधे पण समर्थ. कृती छोटी पण परिणती मोठी.गांधींची सारी शक्ती त्यांच्या उपोषणा त होती. सोडा बायकार्बोनेट मिश्रित पाण्याच्या एका पेल्यात संबंध ब्रिटिश साम्राज्याला त्यांनी रिकवून टाकले होते. गांधींच्या कृश आकृतीत भारताची श्रद्धालू भोळीभाबडी,परमेश्वराची पाईक असणारी जनता एका थोर महात्म्याची लक्षणे अनुभवत होती.ते ज्या मार्गाने नेतोल त्या मागनि, निमूटपणे,आज्ञाधारक मुलाप्रमाणे,

त्यांचे बोट धरुन जात होती. त्या शतकातील ते एक थोर व्यक्तिमत्व होते.त्यांच्या अनुयायांनी तर त्यांना संतपदाला नेऊन पोचवले होते.इंग्रज अधिकाऱ्यांना उच्चपदस्थांना मात्र गांधी धूर्त व कारस्थानी वृत्तीची व्यक्ती वाटत.त्यांच्या आमरण उपोषणाचा अंत मृत्यूच्या सीमारेषेवर घडताना दिसत होता.त्यांनी आरंभलेल्या अहिंसक चळवळीचे पर्यवसान नकळत हिसेंत झालेले आढळून येई.व्हॉईसरॉय लॉर्ड वेव्हेल तसे मृदू अंतकरणाचे;पण त्यांनाही गांधीच्या या पावित्र्याचा तिटकारा होता.त्यांच्या मते गांधी म्हणजे 'संधिसाधू,आपलाच वरचष्मा ठेवण्याची हाव असलेला,

एक दुतोंडी माणूस' होता.


गांधींबरोबर चर्चा करण्याचे योग आलेल्या ब्रिटिश अधिकाऱ्यांपैकी फारच थोड्यांना ते प्रिय होते.त्यातही फारच थोड्यांना ते खऱ्या अर्थाने समजले होते.थोडक्यात,

गांधी म्हणजे नियतीने ब्रिटिशांना घातलेले एक अनाकलनीय कोडेच होते म्हणा ना! तसा माणूस अजबच.महान नैतिक अचारणाबरोबर एक प्रकारचा विचित्र विक्षिप्तपणा त्यांच्या व्याक्तिमत्वात सामावून राहिला होता.गहन अशा राजकीय कूट प्रश्नावर चालू असलेल्या एकीकडच्या चर्चेत मध्येच लैंगिक संयम किवा मिठाच्या पाण्याचा एनिमा अशा-सारख्या वेगवेगळ्या विषयावर अगदी सहजपणे बोलण्यात त्यांना कसलीही भीती वाटत नसे.असे म्हणत की,ज्या ठिकाणी गांधी वास करत ते स्थळ भारताची राजधानी बनून राहायचे तात्पुरते.आजच्या एक जानेवारीच्या शुभदिनी ते बंगालमधील श्रीरामपूरसारख्या एका लहानशा खेड्यात येऊन ठाकले होते.त्या खेडयात कोणतीही आधुनिक सुविधा नव्हती. नुसता फोन करायचा झाल्यास तीस मैल चालायची गरज लागे.पण या असल्या एकाकी खेड्यातून गांधी सर्व उपखंडावर आपला वचक ठेवून होते.नौखाली विभागातील भौगोलिक स्थिती तशी अडचणीची.अगदी दुर्गम असा प्रदेश,जेमतेम चाळीस चौरस मैल.चारी बाजूंनी पाणी.पण तरीही अडीचएक दशलक्ष लोकसंख्या ठेचून भरलेला.त्या संख्येपैकी ऐंशी टक्के जनता मुसलमान.तसे बघायला गेले तर तो दिवस गांधीच्या आयुष्यातील एक अतिशय समाधानाचा दिवस असायला हवा होता.कारण, ज्या एका ध्येयसिद्धीसाठी त्यांनी अविरत असा झगडा दिला ते स्वातंत्र्य आता दृष्टिपथात आलेले दिसत होते.

संघर्षाचा हा अत्युच्च क्षण नजीक येत असताना गांधी मात्र अत्यंत खिन्न व निराश मनःस्थितीत चाचपडत होते.

त्याला कारणही तेवढेच सबळ होते.स्वातंत्र्यदेवतेच्या स्वागतासाठी भयानक जातीय दंगलीच्या पायघड्या घातल्या जात असलेले पाहणे त्यांच्या नशिबात होते.

नौखाली हा त्या दंगलीचा केन्द्रबिंदू ठरला होता.

जिकडेतिकडे अमानुष अशा कत्तलींना उत आलेला.

एकमेकांच्या घरांच्या होळया पेटलेल्या.या दंगलीची झळ साऱ्या देशाला लागण्याची भीती वाटत होती.एवढेच नव्हे तर तिचे पडसाद ॲटलींच्या संभाषणातदेखील उमटलेले दिसले.लॉर्ड माऊन्टबॅटनना दिल्लीला तातडीने पाठवण्याच्या त्यांच्या धोरणाचे निमित्तही तेच होते.आज गांधीही त्यासाठीच श्रीरामपूरात तळ ठोकून राहिले होते.

वास्तविक विजयोत्सवाच्या तयारीला ज्यांनी लागायला हवे तेच एकमेकांच्या उरावर बसून गळे घोटत होते ही केवढी दुःखाची गोष्ट ! गांधींचे अंतकरण शत:श विदीर्ण होत होते हे बघताना.अद्यापही आपल्यामागून मोठ्या आदराने आलेल्या आपल्या देशबांधवांना अहिंसेची महती पटू नये ! यूरोपातील युद्धात झालेल्या अत्याचारी अणुबॉम्बच्या वापरामुळे झालेली हानी बघून त्यांची अहिंसेवरील श्रद्धा अधिकच दृढमूल झाली होती.नव्याने स्वतंत्र्य होणाऱ्या भारताने आशियाला एक नवा मार्ग दाखवावा,नवी प्रेरणा द्यावी याकडे त्यांचे लक्ष होते आणि नेमक्या याच वेळी आपल्याच देशबांधवांनी अहिंसेकडे पाठ फिरवावी ! कोणत्या आशेवर जगायचे आता,असा प्रश्न गांधींना पडला.स्वातंत्र्यप्राप्तीकडे राष्ट्र करत असलेली आगेकूच या अमानुष कृत्यांमुळे कुचकामाची ठरणार होती.त्या विजयश्रीला कसलाच अर्थ उरणार नव्हता.त्यात उन्माद तो कोठून येणार अशाने ?या शिवाय आणखी एक गोष्ट गांधींना छळत होती.ती म्हणजे भारताचे विभाजन.तेही धर्मतत्त्वाच्या आधारावर.


आजपर्यंत गांधीनी ज्या निधर्मी तत्त्वाचा हिरीरीने पुरस्कार केला त्याचा चोळामेळा झाला होता.तो त्यांचा मोठा पराभव होता.भारतातील मुसलमानधर्मी राजकारणी पुरुषांनो मागणी केलेल्या त्यांच्या परमप्रिय मातृभूमीच्या फाळणीने त्याच्या शरीरातील कण न् कण आक्रंदत होता.एखाद्या पौर्वात्य गालिच्यातील धाग्यांप्रमाणे भारतातील वेगवेगळचा धर्माचे लोक गुंतले गेले आहेत असे त्यांचे मत होते.


 'भारताचे खंडन करण्याआधी तुम्हाला माझ्या शरीराचे तुकडे करावे लागतील'असे त्यांनी वारंवार घोषित केले होते.जातीय दंगलीत होरपळून गेलेल्या श्रीरामपुरात गांधी आपल्या अंतःकरणातील निःस्सीम श्रद्धेचा शोध घेत होते. तेथील दंगल इतरत्र पसरू नये याची खबरदारी त्यांना घ्यावयाची होती.'सगळीकडे दाट काळोख पसरला आहे.

त्यांचा भेद करणारा एकही प्रकाश-किरण मला दिसत नाही.सत्य अहिंसा ही माझी श्रद्धास्थाने आहेत.गेली पन्नास वर्षे मी त्यांच्याच आधारावर जगत आहे.परंतु आज ! त्या माझ्या प्राणप्रिय तत्त्वांची प्रचीती मला येऊ नये,हेच माझे दुर्दैव ! मी जी तत्त्वे जीवापाड जोपासली,ज्यांच्यामुळे माझ्या आयुष्याला अर्थ प्राप्त झाला त्या तत्त्वांची ताकद आजमावण्यासाठी,एक नवीन तंत्र शोधून काढण्यासाठी मी येथे मुद्दाम आलो आहे. 


गांधींनी आपल्या अनुयायांना सांगितले.


दिवसामागून दिवस घालवत गांधी त्या गावातून फिरत राहिले.तेथील लोकांशी बोलत राहिले. स्वतःशी चिंतन करू लागले.ते आपल्या 'आतल्या आवाजा' च्या आदेशाची प्रतिक्षा करत होते.त्या आवाजाने त्यांना यापूर्वीच्या अनेक पेचप्रसंगांतून मार्ग दाखवला होता;

आणि अखेर तो आदेश आला.त्या दिवशीच्या निसर्गोपचार-कार्यक्रमानंतर त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना एकत्र केले.आपला मनसुबा त्यांनी जाहीर केला.आता गांधी एका क्लेशयात्रेस आरंभ करणार होते.दंगलग्रस्त नौखाली भागात त्यांची पदयात्रा सुरू होणार होती.

नौखालीची सत्तेचाळीस गावे म्हणजे जवळजवळ एकशेसोळा मैलांचा भूप्रदेश-ते पालथा घालणार होते.पश्चातापाची खूण म्हणून 'अनवाणी चालत चवताळलेल्या मुसलमांनाना आवर घालण्यासाठी हा हिंदू त्यांच्यात जाऊन मिसळणार होता. झोपडी- झोपडीत जाऊन शांततेचा पाठ देणार होता.त्यांच्या या पश्चातापदर्शक प्रवासात त्यांना साथ हवी होती ती फक्त परमेश्वराची ! आपल्या जोडीला त्यांना केवळ चौघेजणच हवे होते.खेड्यातून हिंडताना जो कोणी जे काही देईल त्यावरच गुजराण करायची त्यांची जिद्द होती.


काँग्रेस व मुस्लीम लीग या पक्षाचे राजकारणी दिल्लीत बसून चर्चेचा वाटेल तेवढा घोळ घालत भारताच्या भवितव्याच्या खुशाल चिंध्या करू देत.अखेर त्यांच्यापुढील समस्यांचे उत्तर त्यांना नेहमीसारखे या देशातील खेड्यातच शोधावे लागणार आहे.हिंदु-मुसलमानात बंधुभाव व सलोखा निर्माण करण्याचा हा माझा शेवटचा महान प्रयोग आहे.बर तो यशस्वी झाला तर सारे राष्ट्र त्यांच्या तेजाने उजळून निघेल या नौखालीत पुन्हा एकदा अहिंसेची मशाल प्रज्वलित होईल व तिच्या झळीने भारताला पछाडणारे जातीय- वादाचे भूत पार पळून जाईल असा माझा विश्वास आहे.' ही गांधीवाणी अपार विश्वासाची होती.गांधींनी एका भल्या पहाटे त्यांच्या पदयात्रेस आरंभ केला.त्यांच्यासमवेत त्यांची एकोणीस वर्षांची नात-मनू-होती,जवळच्या सामानात कागद,चरखा व त्यांना गुरुस्थानी असणारी तीन हस्तिदंती माकडे-कानांवर,डोळयांवर व तोंडावर हात धरून बसलेली,

भगवद्गीता,कुराण,येशू ख्रिस्ताच्या तत्त्वांची व आचरणाची पुस्तिका यांचा समावेश होता. 


हातात बांबूची लाठी घेतलेला तो सत्त्याहत्तर वर्षांचा वृद्ध आपल्या हरवलेल्या स्वप्नांचा शोध घेण्यासाठी निर्धाराने पावले टाकत चालला. निरोप देणारे गावकरी गुरुदेव टागोरांचे गीत गात होते.गांधींना प्रिय असणाऱ्या त्यातील एका गीताचे स्वर गांधीही गुणगुणत होते--


' जरी त्यांची साद ऐकू आली नाही.तरी तू तसाच पुढे चल-एकटा.चल अकेला '


हिंदु-मुसलमानातील जातीय दंगली हा भारताला नियतीने दिलेला एक कठोर शाप होता.हजारो वर्षांची परंपरा पाठिशी घेऊन आलेला तो शाप थेट ख्रिस्ती सनापूर्वी पंचवीसशे वर्षांमागून छळत येत होता.हिंदूंच्या या मातृभूमीवर मध्ययुगात मुसलमानांनी आक्रमण करून अठराव्या शतकापर्यंत त्या देशात राज्य केले होते.


या दोन्ही धर्मात अगदी कमालीचा फरक होता. अगदी आधिभौतिक तत्त्वांपासून ते थेट सामाजिक रूढीपर्यंत त्यांचे आचारविचार परस्पर विरोधी होते.अठराव्या शतकात इंग्रज आले व मुसलमानी साम्राज्य संपले.मात्र या दोघातील संशयाचे वातावरण कायमच टिकले. मुसलमानांना केलेल्या अत्याचारांचा हिंदूंना विसर पडला नाही.शिवाय,या दोन्ही समाजात आर्थिक स्पर्धाही होतच राहिली.त्यामुळे मूळच्या सामाजिक व धार्मिक प्रश्नांचे गांभीर्य वाढतच गेले.आध्यात्मिक व धार्मिक प्रवृत्तीच्या या खंडप्राय देशात स्वातंत्र्ययुद्धास धर्मयुद्धाचे रूप येण्यात नवल नव्हते.कळत नकळत हे रूप देण्यास गांधीच कारणीभूत झाले.वास्तविक, धर्मसहिष्णुतेच्या बाबतीत गांधींचा हात कोणीही धरला नसता.भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात मुसलमानांना सहभागी करून घेण्याचा आग्रहही त्यांचाच.पण अखेर गांधी स्वतःएक 'हिंदू' होते. परमेश्वराच्या अस्तित्वावर त्यांची अविचल श्रद्धा होती.तो त्यांच्या जीवनाचा अविभाज्य घटक होता.आजाणतेपणी त्यांच्या चळवळीला हिंदुत्वाची छटा लाभली.कदाचित ते अपरिहार्यही असेल.पण नेमकी तीच गोष्ट भारतीय मुसलमानांच्या मनात संशय व अविश्वासाचे बीज रोवून राहिली.चातुर्वण्यभेद व पुनर्जन्म यांवर हिंदूंचा असणारा विश्वास हा एक अडथळाच ठरला.ती एक अढी होऊन बसली.वेळोवेळी झालेल्या निवडणुकांत मुसलमानांना सहभागी करून घेण्यास स्थानिक काँग्रेस नेत्यांनी सतत नकार दिला.) त्यामुळे स्वातंत्र्यप्राप्तीनंतर हिंदुस्थानात आपण अल्पसंख्यच राहणार, बहुसंख्यांक हिंदू आपल्यावर अन्यायच करणार ही जाणीव दृढ झाली.ज्या भूमीवर आपले पूर्वज सत्ताधीश म्हणून राहिले त्याच भूमीत आपल्याला दुबळे,अवमानित जीवन जगावे लागणार ही कल्पनाच त्यांना असह्य वाटू लागली.या फेऱ्यातून सुटका करून घेण्याचा एकच मार्ग त्यांच्यापुढे उरला व तो म्हणजे या उपखंडावर आपल्या समाजासाठी स्वतंत्र अशा इस्लामी राज्याची निर्मिती.


मुसलमान मागणी करत असलेल्या या राज्याच्या योजनेचे बीजारोपण प्रत्यक्षात इंग्लंडातील केंब्रिजमधल्या एका साध्या निवासात झाले म्हणे! एका चार-साडेचार पानांच्या कागदावर टंकलिखित केलेल्या त्या आराखड्याचा उद्‌गाता होता एक भारतीय मुसलमान पदवीधर,रहिमत अली त्याचे नाव.त्याचे वय त्यावेळी चाळीस होते.२८ जानेवारी १९३३ या दिवशी त्याने काही मंडळी जमवली.भारत हे एकसंघ राष्ट्र आहे.या मूळ कल्पनेची संभावना त्याने 'एक पूर्णतः विसंगत वाटणारे असत्य' या शब्दांत केली. पंजाब,सिंध,सरहद्द प्रांत,बलुचिस्थात,

काश्मीर या भूप्रदेशात मुसलमानांची संख्या अधिक आहे,सबब त्या भूमीचे एका वेगळया मुसलमान राष्ट्रात रूपांतर झाले पाहिजे असे त्याने सुचविले.त्या राष्ट्रासाठी त्याने नावही दिले-पाकिस्तान (पवित्र प्रदेश). हिंदु राष्ट्रवादाच्या वेदीवर आम्ही बळी जाऊ इच्छित नाही'अशा अलंकारिक शद्वात त्याने आपल्या निवेदनाचा समारोप केला होता.


रहिमत अलीच्या या गाभ्याचा भारतीय मुसलमानांच्या राजकीय आकाक्षांना खतपाणी घालणाऱ्या मुस्लीम लीगने स्वीकार केला व त्याच पायावर आपली चळवळ उभी केली. बॅ.जिना त्या मूळच्या सभेला उपस्थित होते. आपल्यासाठी स्वतंत्र राष्ट्र ही कल्पना मुसलमानांना रुचली यात नवल नाही.शिवाय काँग्रेसच्या पुढाऱ्यांची वागणूक त्यांना उपकारच ठरली. १६ ऑगस्ट' हा दिवस प्रत्यक्ष कृति दिन' म्हणून पाळण्याची हाक लीगच्या नेत्यांनी मुसलमान जनतेला दिली.जरूर पडेल तर प्रत्यक्ष कृतीनेच पाकिस्तान स्थापन करण्याची प्रतिज्ञा त्यांनी केली.बस्स! एवढे निमित्त पुरे झाले.


कलकत्ता शहरात जातीय दंग्याची ठिणगी पडली.

मुसलमानांच्या झुंडी हिंदूंचा निःपात करण्यासाठी रस्त्यावर आल्या.प्रतिकाराने पेट घ्यायला वेळ लागलाच नाही.कलकत्ता,बिहार, नोखाली,मुंबई या शहरात अत्याचारांनी थैमान घातले.हुगळीचा रंग रक्त- रंजित झाला. गिधाडांची चैन झाली.एकट्या कलकत्त्यात सहा हजार लोक यमसदनास गेले.भारताच्या भूमीवर एक नवे यादवी युद्ध सुरू झाले.भारताच्या इतिहासात कलाटणी मिळण्याचा क्षण जवळ आला. 'आमचे राष्ट्र आम्हाला मिळाले नाही तर सगळा भारत आम्ही आमच्या ताब्यात घेऊ' अशी धमकी मुसलमानांनी दिली होती.तिची चाहूल लागायला आरंभ झाला.पुण्यभूमी नरकभूमी बनली.गांधी अतिशय व्यथित झाले.एकीकडे गांधी दुःखी,तर दुसरीकडे महंमदअली जिना खूष.गेल्या पाच शतकाचा गांधीचा प्रमुख राजकीय वैरी बॅरिस्टर जिना.एक चाणाक्ष व बुद्धिमान वकील.भारतात उसळलेल्या जातीय दंग्यांचे भांडवल कितपत करावे हे कळण्याइतकी अक्कल त्यांना होती.( फ्रीडम ॲट मिडनाईट मूळ लेखक- लॅरी कॉलिन्स,

डोमिनिक लापिए,भाषांतर- राजेंद्र व्होरा,अनिल गोरे,संस्करण- माधव मोर्डेकर,अजब पुस्तकालय कोल्हापूर) इतिहास जिनांच्या कर्तुत्वाची नोंद घेईल की नाही याची शंका आहे. (अर्थात,त्यांच्या जमातीच्या इतिहासात ती होणारच !) पण तरीही गांधी किंवा इतर कोणाच्याही हातात नसलेली भारताच्या भवितव्याचा दरवाजा खोलण्याची चावी फक्त जिनांच्याच हातात होती.अशा या कठोर प्रवृत्तीच्या,मिळतेजुळते न घेणाऱ्या दुराग्रही माणसाशी व्हिक्टोरिया राणीच्या पणतूची-लॉर्ड माऊन्टबॅटन यांची-गाठ होती.


१९४६ च्या ऑगस्ट महिन्यात मुंबईबाहेरील एका तबूंत आपल्या अनुयायांसमोर परिस्थितीचे मूल्यमापन करताना जिनांनी त्यांना 'प्रत्यक्ष कृती' चा अर्थ विशद करून सांगितला होता.त्यांनी जाहीर केले : जर काँग्रेसला युद्धच खेळावयाचे असेल तर त्यासाठी आम्ही एका पायावर उभे आहोत.'आपल्या निर्वीकार चेहऱ्यावर स्मित हास्याची लकेर उमटवत,आपल्या भेदक डोळयांत अंतःकरणातील दबलेल्या विकारांना वाट करत बॅ.जिनांच्या निस्तेज ओठातून आव्हान असे होते :


हिंदुस्थान खंडित तरी किंवा खत्म तरी होईल ! आम्ही मुसलमान त्याशिवाय गप्प बसणार नाही हे ब्रिटिशांनी व काँग्रेसने नीट ध्यानात ठेवावे.'





८/५/२४

जैन धर्माचा इतिहास History of Jainism

इ.पू.सहावे शतक हे मानवी इतिहासातील अत्यंत महत्त्वाचे शतक आहे.वैचारिक जागृती हे या कालाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. हिंदुस्थानातच नव्हे तर इतर भागातही वैचारिक क्षेत्रात या वेळी महत्त्वपूर्ण घटना घडल्या. इराणमध्ये झरतुष्ट्र व चीनमध्ये कन्फ्युशियस यांनी आपल्या विचारांचा प्रभाव पाडण्यास सुरुवात केली होती.या कालातच हिंदुस्थानातही फार मोठा बदल प्रकषनि घडत होता.धार्मिक क्षेत्रात औपनिषदिक विचारांमुळे अगोदरच नवे विचारांकुर आले होते.यज्ञमूलक हिंदू धर्मावर उपनिषत्कारांनी हल्ले चढविले होते. उपनिषदांतील विचार ब्रह्मन्,आत्मन्,मुक्ती, कर्म, मानव,ईश्वर,जगत् जीवात्मा,परमात्मा आदींभोवती केंद्रित झाले होते.हळूहळू यज्ञयाग, संस्कार व विधी यांचा कंटाळा येऊ लागला होता.आत्मज्ञानप्राप्तीसाठी ज्ञानमार्ग श्रेष्ठ असून त्यासाठी तत्त्वचिंतन आवश्यक आहे हा विचार वाढून आधिभौतिक सुखापेक्षा आध्यात्मिक बल वाढविण्यासाठी काही लोक धडपडत होते. चिरंतन सुखासाठी व दुःखविमोचनासाठी ब्रह्मज्ञानप्राप्ती आवश्यक आहे,हे मान्य होऊ लागले होते.सर्वसामान्य माणसास यज्ञयागाचे क्लिष्ट स्वरूप आकलन होत नव्हते. उपनिषत्कारांनी एवढी जागृती करूनही रूढ झालेले यज्ञयाग,लोकांचा देवदेवतांवरील विश्वास,वर्णाश्रमव्यवस्था या गोष्टी कमी होत नव्हत्या.त्यामुळे सर्व समाज संभ्रमावस्थेत होता. या वेळी अनेक जण वेगवेगळे विचार मांडीत होते.बरेच संप्रदाय प्रचलित होऊ लागले होते. संदेहवादी,तर्कवादी,भौतिकवादी,मूलतत्त्ववादी इत्यादी साठाहून अधिक संप्रदाय सुरू झाले होते.अशा या कालातच जैन व बौद्ध या धर्माचा उदय झाला.


जैन धर्म


जैन धर्म हा हिंदुधर्माचाच एक भाग आहे,अलग झालेली एक शाखा आहे,असे अनेक जण समजतात;मात्र जैनधर्मीयांना ही गोष्ट मान्य नाही.याबाबत 'वैदिक संस्कृतीचा विकास' या ग्रंथामधील तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचे मत पुढीलप्रमाणे आहे :"सर्व हिंदू व जैन तत्त्वज्ञान व्यापक अर्थाने एकच आहे. कर्मसिद्धांत व मोक्षसिद्धांत हे सर्व हिंदू तत्त्ववेत्त्यांचे समान आहेत.

आचार,व्यवहार, भाषा,कला,वाड् मय,ध्येयवाद अभिरुची इत्यादी सांस्कृतिक समानता इतर हिंदूंप्रमाणेच जैनांत सापडते.(तळटिप - १ पाली वाङ्मयानुसार बौद्ध धर्माच्या उदयकाली असे ६२ संप्रदाय अस्तित्वात होते,तर जैन मतानुसार त्यांची संख्या ३६३होती.


जैन समाज एका व्यापक हिंदू संस्कृतीच्या छत्राखालीच वावरत आहे,असे निश्चितपणे म्हणता येते." जैन मतानुसार हा धर्म अतिप्राचीन असून या धर्मात होऊन गेलेल्या एकूण २४ तीर्थंकरांपैकी वर्धमान महावीर हा शेवटचा तीर्थंकर होय.मात्र या धर्माचे महावीराच्या अगोदरचे स्वरूप स्पष्ट नाही. त्यामुळे महावीरालाच जैनधर्मसंस्थापक मानले जाते.या चोवीस तीर्थंकरांपैकी पहिल्या ऋषभ तीर्थंकरांपासून बावीस तीर्थंकरांविषयी विशेष माहिती उपलब्ध नाही.मात्र ब्रह्मांड पुराण, भागवत पुराण,स्कंद पुराण,महाभारत या ग्रंथांमध्ये जैन तीर्थंकरांचे उल्लेख आहेत. महावीराअगोदरचा तेविसावा तीर्थंकर पार्श्वनाथ हा होय.पार्श्वनाथाबद्दल एकूण माहिती गौतम बुद्धाप्रमाणेच आहे.सुरुवातीचे आयुष्य अत्यंत सुखासीन व ऐषआरामात घालविणाऱ्या पार्श्वानाथाने तिसाव्या वर्षी गृहत्याग करून ज्ञानप्राप्ती (कैवल्य) करून घेतली व पुढील सर्व आयुष्य संन्यस्तवृत्तीने घालविले.सत्य,अहिंसा,अस्तेय व अपरिग्रह ही चार तत्त्वे पार्श्वनाथाने दिली.पार्श्वनाथ हा बनारसचा राजा अश्वसेन याचा पुत्र होता.त्याने प्रभावती नावाच्या राजकन्येशी विवाह केला.या पार्श्वनाचे कार्यच पुढे २५० वर्षांनी महावीराने स्वतःकडे घेतले व जैन धर्मास स्पष्ट व पद्धतशीर स्वरूप दिले.


वर्धमान महावीर


इ.पू.५९९ च्या सुमारास महावीराचा जन्म वैशालीच्या कुंदग्राम नावाच्या उपनगरात झाला. त्याच्या वडिलांचे नाव सिद्धार्थ व आईचे नाव त्रिशला असे होते.वडील ज्ञातृक-क्षत्रिय घराण्यातील प्रमुख व सुखवस्तू गृहस्थ होते.आई त्रिशला ही वैशालीचा लिच्छवी सरदार चेटक याची बहीण होती,तर चेटकाची मुलगी बिंबिसाराला दिली होती.आईवडील धार्मिक वृत्तीचे व पुनर्जन्मावर विश्वास ठेवणारे होते. उपोषण व व्रतवैकल्ये करूनच त्यांनी देहत्याग केला.महावीराचे प्रभावती नावाच्या सुंदर मुलीशी लग्न झाले व तिजपासून त्यास अनोज्जा ही कन्याही झाली.आई वडिलांच्या मृत्यूचा त्याच्यावर मोठा परिणाम झाला व महावीराने वयाच्या तिसाव्या वर्षीच वडील बंधू नंदिवर्धन यांच्या संमतीने गृहत्याग केला.


संन्यस्त राहून त्याने कडक तपस्या आरंभिली. १२ वर्षे शक्ती व ज्ञान यांच्या प्राप्तीसाठी घोर तपश्चर्येने त्याने इंद्रियदमनाचे कष्ट सोसले, दिगंबरवृत्ती स्वीकारली.शेवटी जूपालिका नदीच्या काठी एका जुन्या मंदिरात तपश्चर्या करीत असतानाच त्यास (तळटिप - १. ऋषभ हा नाभिराज व परूदेवी यांचा मुलगा,गादीवर आल्यानंतर एकदा नर्तकी नाचत असतानाच ती गतप्राण झाल्याचे पाहून त्याने संसारत्याग केला. मुलाला गादीवर बसवून त्याने तपश्चर्या केली व कैवल्यपद प्राप्त केले. २.या बावीस तीर्थंकरांची नावे ऋषभ,अजित,संभव,अभिनंदन,

सुमती, पद्मप्रभू,सुपार्श्व,चंद्रप्रभू,पुष्पदंत,शीतल,श्रेयांस, वासुपूज्य,विमल,अनंत,धर्म,शांती,कुंभू,अरह, मल्ली,

मुनिसुव्रत,नमी व नेमी) 


केवलज्ञानप्राप्ती झाली,ईप्सित मिळाले,त्याने सर्व इंद्रियावर ताबा मिळविला तो जितेंद्रिय झाला.

त्यामुळेच त्यास 'जिन','अर्हत','जेता', 'निग्रंथ' अथवा 'बंधनविरहित'असे म्हणतात व त्याचे अनुयायी 'जैन' या नावाने ओळखले जाऊ लागले. पुढील जीवनाची सुमारे ३० वर्षे वर्धमान महावीराने आपल्या विचारांचा प्रसार करण्यात घालविली.त्याच्या धर्मास जैन धर्म नाव मिळाले.दया,क्षमा व शांती यांचा सुरेख संगम त्याच्या ठिकाणी झाला होता.मोठमोठ्या घराण्यांशी त्याचा संबंध आला होता.विदेह,अंग, मगध,मिथिला,कोसल या भागांत त्याने धर्मप्रचार हिरिरीने केला.पार्श्वनाथाने दिलेल्या सत्य, अस्तेय,अहिंसा,अपरिग्रह या चार तत्त्वांमध्ये ब्रह्मचर्य हे पाचवे तत्त्व त्याने घातले. या पाच व्रतांना 'धर्माज्ञा' किंवा 'महाव्रते' असे म्हणतात.गृहस्थाश्रम्यांनी (श्रावक) व संन्यस्तांनी पाळावयाची वेगवेगळी व्रते असून गृहस्थाने बारा व्रते पाळवयाची आहेत.त्यांपैकी पहिल्या पाच व्रतांना 'अणुव्रत', सहा ते आठ व्रतांना 'गुणव्रत' व शेवटच्या चार व्रतांना 'शिक्षाव्रत' असे म्हणतात.

मगधाच्या राज्यकर्त्यांनी जैन धर्माला मोठा आश्रय दिला होता.शेवटी वयाच्या ७२ व्या वर्षी पाटणा जिल्ह्यातील पावापूर येथे इ.पू. ५२७ मध्ये महावीर मरण पावले.' मृत्युसमयी त्याचे सुमारे १४००० अनुयायी होते.


महावीराची शिकवण व जैन धर्माची मूलतत्वे


महावीराने ब्रह्मचर्यास जास्त महत्त्व दिले होते म्हणूनच त्याने पार्श्वाच्या चार नियमांत पाचवा ब्रह्मचर्य हा नियम घातला.या पाच नियमांसच 'धर्माज्ञा' अथवा 'महाव्रते' असे म्हणतात. वर्धमान आत्मक्लेश महत्त्वाचा मानतो.

पाच तत्त्वांचे पालन करावे व दिगंबर राहून धर्मप्रचार करावा,तसेच 'जगा व जगू द्या'अशी आज्ञा त्याने अनुयायांना दिली आहे.'वेद अपौरुषेय आहेत' हे जैन धर्मास मान्य नाही.वेद,वैदिक यज्ञयाग, विधी,विश्वनिर्माता परमेश्वर या कल्पना जैनधर्मीयांना अमान्य आहेत.

परमेश्वरापेक्षा आत्मा महत्त्वाचा असून विशुद्ध आत्मा हाच परमात्मा होय.मुक्तात्मा हाच परमेश्वर व पूर्णावस्थेप्रत गेलेला आत्मा म्हणजेच जिन किंवा जैन असे ते मानतात.जिनपद मिळविण्यासाठी इंद्रियांवर ताबा मिळविणे व केवलज्ञान मिळविणे आवश्यक असून,ती अवस्था पाच अवस्थांतून गेल्यानंतर प्राप्त होते.या पाच अवस्था म्हणजे मतिज्ञान,श्रुतिज्ञान,अवधिज्ञान,

मनःपर्यायज्ञान व केवलज्ञान या होत.केवलज्ञानप्राप्तीनंतर भूत, वर्तमान,तसेच भविष्य काळांतील ज्ञानप्राप्ती होते.जीव मुक्त ( तळटिप - १. पांच तत्त्वे :- १) सत्य - सत्याचा पुरस्कार,२) अहिंसा - काया, वाचा व मनाने कोणालाही दुखवू नये.३) अस्तेय - न दिलेली कोणतीही वस्तू घेऊ नये. ४) अपरिग्रह स्वार्थी वृत्ती असू नये.

कसलाही संचय करू नये. ५) ब्रह्मचर्य - ब्रह्मचर्य पाळावे.

२. काही जण महावीर ख्रिस्तपूर्व ५४६ मध्ये मरण पावला,असे मानतात.) 


होतो व व्यक्ती अर्हत् अवस्थेस पोहोचते.पृथ्वी व जीव स्वयंभू व अनादी असून जीव व अजीव किंवा चल व अचल् तसेच आत्मा व देह यांच्या संयोगामुळे सर्व व्यवहार व संसार चालू आहेत. विश्वनिर्मितीस परमेश्वर कारणीभूत नाही.जीव व कर्म यांचा संयोग पूर्वीपासून असून कर्मापासून जीव स्वतंत्र झाला की तो मोक्षाप्रत जातो.ही जीवमुक्ती घडवून आणणे हे धर्माचे कार्य आहे व त्यामुळेच जीवाची शुद्धी व तेजही स्पष्ट होईल. थोडक्यात,जैन धर्माचे सर्व सार व केन्द्रबिंदू आत्मा हाच आहे.हा आत्मा वा जीव कर्मापासून मुक्त झाला म्हणजे मोक्ष मिळतो,असे जैनधर्मीय मानतात.यासाठीच शरीरक्लेश वा आत्मक्लेश याने आत्मशुद्धी व जीवमुक्ती होईल,असे ते समजतात.जन्ममरणाच्या फेऱ्यांतून सुटण्यासाठी त्रिरत्नांचे आचरण आवश्यक मानले जाते. : 


"सम्यग्दर्शन-ज्ञान-चारित्र्याद् हि मोक्षमार्गः।" 'तत्त्वार्थाधिगमसूत्र' या ग्रंथात उमास्वामींनी यांना 'रत्नत्रय' असे म्हटले आहे. सम्यक् दर्शन,सम्यक् ज्ञान व सम्यक् चारित्र्य हीच ती त्रिरत्ने होत व हाच मोक्षमार्ग होय.सम्यक् चारित्र्य म्हणजेच सत्य,अहिंसा,अस्तेय,अपरिग्रह व ब्रह्मचर्य या पाच आज्ञांचे पालन होय.गृहस्थाश्रमी,संन्यासी व श्रावक यांनी या नियमांचे पालन करावे.


आवश्यकतेपेक्षा जास्त असलेल्या संपत्तीचा दानधर्म करावा.अहिंसा हे जैन धर्मातील महत्त्वाचे मूलतत्त्व.सर्वच ठिकाणी आत्मा आहे, त्यामुळेच अत्यंत क्षुद्र जीवाचीही हिंसा त्याज्य मानली जाते.प्राणिहत्या हे महापाप,मग ते प्राणी कितीही लहान वा क्षुद्र असोत.त्यामुळेच पाण्यातील जीवही पोटात जाऊ नयेत म्हणून पाणी गाळून पिणे,

हवेतील जीवाणूंची हत्या होऊ नये म्हणून हवा गाळून शोषण करणे,रात्री न भटकणे,शेती न करणे,वरचेवर उपवास करणे, या गोष्टी जैन पाळतात.मृत्यू चुकत नाही, यासाठीच आत्मक्लेश व शरीरक्लेश घ्यावे. आमरण अन्नत्याग करावा व इहलोक सोडावा, यासच 'सल्लेखना' म्हणतात. त्रिरत्नांनी मोक्षमार्गाची वाटचाल करावी व आत्म्याची जन्ममरणापासून मुक्ती करावी. यालाच अर्हत् असे म्हणतात.अशा 'अर्हता'मुळे 'सिद्धशील' निःस्वार्थीपणे राहणे,हिंसा टाळणे, सत्य बोलणे,यावरच जैन धर्म आधारला आहे, असे म्हणावे लागेल.अशा या जैन धर्माची सर्व माहिती आज उपलब्ध असलेल्या प्राचीन व पवित्र अशा ४५ ग्रंथात दिलेली आहे. हे ग्रंथ प्राकृत व अर्धमागधी भाषेत असून त्यांमध्ये अनेक तत्त्वबोधक कथा व टीकावाङ्‌मयही आहे. जैन धर्मग्रंथास 'पूर्व' म्हणतात.पूर्वामध्ये महावीराची वचने आहेत.भद्रबाहू या आचार्याने जैन वाङ् मय नष्ट होईल या भीतीने पाटलीपुत्र येथे धर्मपरिषद भरविली.पुढे वलभी येथेही पाचव्या शतकात एक परिषद झाली.आज या धर्माचे एकूण ११ पूर्व आहेत.आचार्य भद्रबाहूच्या काळी जैन धर्मातील मतभेद वाढले व त्यातूनच जैनधर्मात परस्परविरोधी असे दोन पंथ निर्माण झाले.इ.स.७९ च्या सुमारास हे दोन गट स्पष्ट झाले.श्वेतांबर व दिगंबर हे ते दोन पंथ होत.


श्वेतांबरपंथी जैन श्वेत वस्त्र वापरतात, परिषदेने मान्य केलेले धर्मग्रंथ प्रमाण मानतात. स्त्रियांनाही प्रयत्न केल्यास मुक्ती मिळू शकते, असे मानतात.सर्व केस काढणे,भिक्षा मागून उपजीविका करणे,इतर व्रत- वैकल्ये करणे, अशा प्रकारे जीवन आचरतात.दिगंबरपंथियांपेक्षा हे लोक कमी कर्मठ असून सुधारक प्रवृत्तीचे आहेत.त्यांना जिनसाधु असे म्हणतात.या उलट दिगंबर जैन दिशा हेच वस्त्र मानून नग्नावस्थेत वावरतात,अत्यंत कडकरीत्या व्रतवैकल्ये करतात. स्त्रियांना मोक्ष अप्राप्य आहे, असे मानतात. केस उपटून, संन्यस्त राहून, शरीरक्लेश घेतात. हातात मयूरपुच्छ बाळगतात व ओंजळीने पाणी पितात.

अशा प्रकारे हे लोक कर्मठ व सनातन वृत्तीचे आहेत. या दिगंबरांना 'जिनऋषी' असे म्हणतात.


जैन धर्माचा प्रसार व ऱ्हास


चोविसावा तीर्थंकर वर्धमान महावीर तत्कालीन अनेक राजकीय घराण्यांशी संबंधित असल्याने त्याच्या धर्मास राजाश्रय मिळाला.वैशालीचा राजा चेटक,वत्स देशाचा राजा उदयन,तसेच शिशुनाग वंशातील श्रेणिक राजा व त्याचा मुलगा हे सर्व श्रावक होते.तसेच मगध राजा नंद याचा जैन धर्मास पाठिंबा होता.तसेच मौर्य सम्राट चंद्रगुप्त हा तर भद्रबाहूचा शिष्य बनला होता. अशोकाचा नातू संप्रती हाही जैन बनला. कलिंगाचा खारवेल जैनच होता.

या सर्वांनी अनेक विहार बांधले व जैन धर्माचा प्रसार केला. तसेच हिंदू धर्मातील क्लिष्टतेस कंटाळलेला समाज तिकडे आकर्षित झाला.वैशाली,मगध, गुजरात सौराष्ट्र,

अंग,विदेह,दख्खन इत्यादी भागांतील बऱ्याच लोकांनी हा धर्म स्वीकारला. साधी व सोपी शिकवण,अर्धमागधी -

सारख्या सोप्या भाषेचे माध्यम,यज्ञयागाचा अभाव,

जातिभेद व अवडंबर यांचा अभाव असा हा धर्म असल्याने त्याचा प्रसार व प्रचार सहजासहजी झाला.मात्र बौद्ध धर्माच्या तुलनेने या धर्मास तितकशी साथ मिळालेली दिसत नाही.यास प्रमुख कारण म्हणजे या धर्मातील कर्मठता होय. 


या धर्माच्या आज्ञेप्रमाणे जीवन जगणे सर्वसामान्य माणसास आवडेनासे झाले.तसेच पुढे राजाश्रयही मिळाला नाही.त्यामुळेच हा धर्म मोठ्या प्रमाणावर पसरू शकला नाही.तसेच बौद्ध धर्मप्रचारकांसारखे प्रचारकही या धर्मास मिळू न शकल्याने हा धर्म हिंदुस्थानाबाहेरही जाऊ शकला नाही.दिग्विजय करण्याचा वा हिंदुस्थानाबाहेर धर्म पसरविण्याचा प्रयत्नही या धर्माच्या अनुयायांनी केलेला नव्हता.भारतामध्ये मात्र इस्लामपूर्व काळातील जैन धर्म हा एक प्रभावी धर्म होता.चंद्रगुप्त मौर्याने (प्राचीन भारत इतिहास आणि संस्कृती,डॉ.गो.बं.

देगलूरकर,अपरांत,प्रकाशक चिंतामणी पराग पुरंदरे)


जैनधर्मप्रसारास मोठे साहाय्य केले.देशाच्या पश्चिम व दक्षिण भागांतही हा धर्म पसरला. आठवा आचार्य भद्रबाहू हा बिहारमध्ये मोठा दुष्काळ पडल्यामुळे अनेक अनुयायांसह म्हैसूरमध्ये आला व श्रवणबेळगोळ येथे राहिला.त्यामुळे दक्षिणेत प्रसार सहज शक्य झाला.या धर्माच्या लोकांनी व्यापार,कला, तत्त्वज्ञान या क्षेत्रांतही मोठी मोलाची कामगिरी बजाविली आहे.

६/५/२४

टॉलस्टॉय प्रेम देणारा Tolstoy the giver of love

१८५६ साली टॉलस्टॉयने सैन्यातून राजीनामा दिला व तो सेंटपीटर्सबर्ग ऊर्फ लेनिनग्राड येथे परत आला.तो येण्यापूर्वीच 'शिपाई व लेखक' म्हणून त्याची कीर्ती तिथे येऊन धडकली होती! तो येताच त्याला लोक साहित्यसम्राट साहित्यातील सिंह समजू लागले.

शहरातील प्रमुख लेखकांनी व कलावंतांनी त्यांचा सत्कार केला.त्याला आपल्या बैठकीतही घेतले.पण ते सारे दांभिक आहेत असे त्याला आढळून आले. त्यांना स्वतःची मते नव्हती.ते संपत्तीचे गुलाम होते.'जो देईल पोळी,त्याची वाजवावी टाळी' असे ते होते.आपण म्हणजे मानव

जातीची वेचक माणिक-मोती असे ते समजत.ते स्वतःला आपल्या काळातील बौद्धिक पुरुषश्रेष्ठ मानीत. आपण सृष्टीचे भूषण आहोत,वैभव आहोत असे ते समजत,ते जे काही लिहीत ते वरिष्ठ वर्गासाठी लिहीत,आपल्या उदात्त विचारांत सहभागी होण्यास बाकीची मानवजात अपात्र आहे असे त्यांना वाटे.पण टॉलस्टॉयची वृत्ती नेमकी याच्या उलट होती.वाड् मय हा त्याचा धर्म होता. साहित्यसेवा त्याला पवित्र वाटे.सौंदर्य व शहाणपण यांचे उपनिषद म्हणजे वाङ् मय साऱ्या मानवजातीने त्यात सहभागी व्हावे,असे त्याला वाटे.साहित्य ही सर्वांची मिळकत,

सर्वांचा साहित्यावर वारसा.'असे त्याचे मत असे.तो मूठभर लोकांची करमणूक करण्यासाठी लिहीत नसे,तर बहुजन समाजाला सुशिक्षित करण्यासाठी लिही.तो बहुजन समाजासाठी लिही,याचा अर्थ त्याला त्याच्या बुद्धिमत्तेची यथार्थ कल्पना नव्हती असा नव्हे.बहुजन समाजाच्या क्षुद्र व तुच्छ जीवनाची बाजू त्याला ठाऊक होती.बहुजन समाज जणू गुराढोरांप्रमाणे वागे,हे टॉलस्टॉय जाणून होता. पण 'नेखलडोव्ह' नायकाप्रमाणे हे शेतकरीही प्रकाशासाठी धडपडत आहेत,ही गोष्टही तो पाहत होता.आंतरिक वृत्तीनेच ते प्रकाशाकडे चाचपडत येत आहेत,हे त्याच्या दृष्टीस दिसत होते.शेतकऱ्यांना,

बहुजन समाजाला कोणीतरी नेता वा मार्गदर्शक हवा होता.'लोकांना काय पाहिजे आहे हे समजून घेण्यासाठी त्यांच्याकडे जा.त्यांच्या गरजा समजून घ्या व त्या पूर्ण होण्यासाठी त्यांना साह्य करा.'


यास्नाया पोलियाना येथे त्याने शेतकऱ्यांची शाळा उघडली.या शाळेत तो पंतोजी म्हणून वागत नसे,तर त्यांच्याबरोबर सहविद्यार्थी होई. तो किसानांचा सहाध्यायी होई.टॉलस्टॉय म्हणे की,'जीवनाच्या गहन,गूढ ग्रंथातील पहिली मुळाक्षरे घोकणाऱ्या मुलांप्रमाणे ते सारे होते.'पोलिसांनी ती शाळा बंद केली. शेतकऱ्यांना त्यांच्या अज्ञानात तसेच पडू दे.' असे टॉलस्टॉयला सांगण्यात आले.यानंतर आजार व निराशा याचे महिने आले.त्याचे दोन भाऊ क्षयाने मेले.आपणासही तोच रोग आहे अशी टॉलस्टॉयला शंका आली.त्याची सारी श्रद्धा लोपली.त्याची मंगलावरची श्रद्धा गेली. त्याचा कशावरच विश्वास उरला नाही.त्याच्या डोक्यात आत्महत्येचे विचार डोकावू लागले.पण या वेळेस त्याच्या कलेने,तसेच त्याच्या प्रेमानेही त्याला वाचवले.सोफिया न्डेयेवना बेहर्स नावाच्या सतरा वर्षांच्या मुलीशी त्याने लग्न केले.तो तिच्या दुप्पट वयाचा होता.त्याने पंधरा वर्षे अमिश्र आनंद उपभोगला.

त्याच्या जीवनाचे आकाश निरभ्र व स्वच्छ होते.त्याची पत्नी बुद्धिमती होती. "मी खऱ्या ग्रंथकाराची पत्नी आहे. माझा तो हक्क आहे." असे ती म्हणे.ती त्याला शुद्धलेखन घाली,त्याच्या कल्पनाशक्तीला चेतवी, त्याला उत्तेजन देई.ती त्याच्या हस्तलिखितांच्या कष्टाने व मेहनतीने नकला करी.जी काही अत्यंत मनोहर पृष्ठे त्याने रंगवली आहेत,त्यांच्यासाठी ती जणू आदर्श म्हणून त्याच्यासमोर असे.या सुखाच्या वातावरणात त्याने दोन अत्यंत मोठ्या कादंबऱ्या लिहिल्या - १. युद्ध व शांती (ही म्हणजे विश्वव्यापक दुःखाचे गद्य महाकाव्य आहे.) २. ना कॅरेनिना- वैयक्तिक वासनाविकारांची शोकांत कथा.पण या कलासेवेमुळे त्याला अद्यापि शांती,समाधान लाभले नाही.आपल्या हातून काहीतरी अधिक चांगले व्हावे असे त्याला वाटत होते.निर्दोष कादंबऱ्या लिहिण्यापेक्षा अधिक उदात्त काहीतरी आपल्या हातून व्हावे अशी अत्यंत उत्कट इच्छा उत्कंठा त्याच्या मनात होती. 'युद्ध व शांती' या कादंबरीतील नायक प्रिन्स ॲन्ड्रयूई हा जेव्हा ऑस्टर्लिट्झ येथे जखमी होऊन पडतो.तेव्हा त्याला जगाच्या आंतरिक शांतीमयतेचे अंधूक दर्शन होते.त्याला वर पसरलेले अनंत आकाश दिसते.पृथ्वीवर चाललेल्या हिंसेकडे,दुष्टपणाकडे व नीचतेकडे आकाश जणू विचारमग्न दृष्टीने पाहत असते आणि ते आकाश पाहून ॲन्ड्रयूईचे मन एकदम अपरंपार व अवर्णनीय आनंदाने उचंबळून येते.जीवनाच्या अंधारातून ही जी अंतर्यामीची शांती अधूनमधून आढळते;हा जो प्रकाश मधूनमधून दिसतो,तो प्रकाश आपल्या मानव बंधूंना देण्याची चिंता टॉलस्टॉयला होती. कलेच्या माध्यमाच्या द्वारा आपणास हे करता येईल,असे त्याला वाटेना.तो एका नवीन प्रकारच्या कलेचा विचार करू लागला.माणसामाणसांत सहानुभूतींचा बंध स्थापण्यासाठी एक निराळीच कला हवी,असे त्याला वाटू लागले.लोकांना प्रकाशाकडे घेऊन जाण्याची इच्छा त्याला होती.पण कोणता प्रकाश?सनातनी धर्मावरची त्याची श्रद्धा तर उडून गेली होती.रूसोने त्याला थोडे दिवस

सनार्थक आनंद व निसर्गाचा आनंद दिला होता. पण अतःपर तेवढ्याने त्याचे समाधान होईना. खरा धर्म मिळावा म्हणून तो पुन्हा तपासू लागला.तीन वर्षे त्याने रोयान कथालिकांचे सर्व आचार व विधिनिषेध पाळले,पण व्यर्थ.त्याचा काहीही उपयोग झाला नाही.त्याची ख्रिस्तावर इतकी दृढ भक्ती होती की,या रूढ सांप्रादायिका ख्रिश्चन लोकांप्रमाणे बाह्याचारी होणे त्याला शक्य झाले नसते,जे विधी,ते समारंभ,ती प्रायश्चित्ते,सारी कर्मकांडे त्याला मूर्खपणाची, पापात्मक,धर्माची निंदा करणारी अशी वाटली. तो लिहितो,'चर्चची शिकवण केवळ कापट्यमय व असत्यमय आहे यासंबंधी माझी खात्री झाली आहे.मूर्खपणाच्या रूढींचा,जादूटोण्यांचा,

चेटकाचा आजार! यांच्या बुजबुजाटात खरा ख्रिश्चन धर्म लुप्त होऊन गेला आहे.जो धर्म मुळात शांती व प्रेम यांच्यावर आधारलेला होता. पण जो आता युद्ध व असहिष्णुता यांचा प्रचार करीत होता.त्या धर्मापासून तो आता कायमचा दूर गेला.


 टॉलस्टॉय आता नवधर्माचा प्रणेता झाला किंवा नवधर्म म्हणण्याऐवजी बुद्धाचाच विस्मृत धर्म,इसाया,

कन्फ्यूशियस व ख्रिस्त यांचाच धर्म तो नव्याने विवरून सांगत होता.तो या नव्या धर्माचा निरंहकारी प्रस्थापक,नेता होता.या धर्मात विधि-निषेधांचे अवडंबर नव्हते. भट-भिक्षुक-उपाध्याय यांचेही बंड नव्हते.यात चर्चची अडगळ नव्हती.काही साध्या आदेशांवर हा धर्म उभारण्यात येणार होता.कोणते हे आदेश ? कोणत्या या आज्ञा? कोणाचेही वैर करू नका, क्रोधाच्या आहारी जाऊ नका,कधीही हिंसा

करू नका.श्रीमंतांची कर्मशून्य विलासलोलुपता, शासनसंस्थेचा जुलूम,चर्चची दुष्टता या गोष्टींविरुद्ध त्याच्या नवधर्माचे बंड होते.'तो समाजवादी,अराजकवादी व चर्च न मानणारा झाला.थोडक्यात म्हणजे,तो ख्रिस्ताचा खरा अनुयायी झाला.'


मानव-जातीच्या सेवेसाठी आपली कीर्ती, आपली प्रतिष्ठा,आपले स्थान,आपली संपत्ती,फार काय पण आपले प्राणही द्यायला तो तयार होता.तो शेतकऱ्याचे साधे कपडे वापरू लागला.परित्यक्त व दीनदरिद्री यांच्यात मिसळू व बसू-उठू लागला.विजयी व उन्नत होण्यासाठी तो नमला होता.आपल्या नवाबी अलगपणापासून तोसामान्य जनतेच्या पातळीवर येऊन उभा राहिला आणि असे करीत असता सर्व मानवजातीला नैतिक भव्यतेच्या उंच स्थानावर, नवीन उच्च भूमिकेवर तो नेत होता.सारे जग त्याला नवीन धर्मदाता म्हणू लागले.त्याचा जयजयकार करू लागले.पण त्याच्या कुटुंबीयांनी त्याला वेडा ठरवले.आपला पती बुद्धिभ्रष्ट होत आहे असे त्याच्या पत्नीला वाटू लागले.त्याचे डोके ठिकाणावर नाही असे वाटून ती घाबरली.तो मानवांच्या बंधुत्वाविषयी बोलू लागला की त्याची मुले जांभया देऊ लागत व निघून जात.केवळ निःस्वार्थ जीवन जगणे म्हणजे मूर्खपणाची निश्चित निशाणी,असे त्यांना वाटे.आपल्या ध्येयासाठी त्याने स्वतःला खुशाल वाहून घ्यावे!पण आपल्या सर्व कुटुंबीयांचा त्यासाठी होम करण्याचा त्याला काय अधिकार,असा त्यांचा सवाल असे. तो स्वतःच्या घरातही जणू अपरिचित झाला! 


त्याची ध्येये कोण ओळखणार?त्याचे अंतरंग कोणाला कळणार?आपल्या मित्राला लिहिलेल्या एका पत्रात तो म्हणतो, 'मला अगदी एकटे एकटे वाटते.माझ्या सांगण्यावर तुमचा विश्वास बसणार नाही.पण वस्तुस्थिती अशी आहे खरी.माझे जे सत्य स्वरूप,माझा जो खरा मी आहे त्याचा भोवतालच्या लोकांकडून उपहास केला जात आहे,त्याची ते सारे उपेक्षा करीत आहेत.अशी मानसिक वेदना होत असताही तो आपले कार्य पुढे रेटीतच होता.. ख्रिस्ती धर्माचा अर्थ तो एकोणिसाव्या शतकाच्या भाषेत समजावून सांगत होता.ख्रिस्ताने ईश्वराचे राज्य स्थापण्याचा प्रयत्न केला,तर टॉलस्टॉयने मानवांचे लोकराज्य स्थापण्याचा यत्न केला.भूतदया,प्रेम,

अन्यायाचा प्रतिकार ही तत्त्वे जनतेच्या मनावर बिंबविण्यासाठी त्याने अनेक निबंध लिहिले. अनेक गोष्टी लिहिल्या.त्याचे पारितोषिक म्हणून चर्चने त्याला १९०१ साली धर्मबाह्य ठरविले.तो वृद्ध होत चालला,तसा त्याच्या शिकवणीत आणखी एक नवीन रंग आला.तो लोकांपासून,कुटुंबीयांपासून,पत्नीपासून,मुलांपासून विन्मुख झाला होता.तो सर्वांचा होता.पण त्याचे कोणीच नव्हते.सर्व मानवी व्यवहाराकडे तो निराळ्याच गूढतेने पाहू लागला,दिव्य दृष्टीने पाहू लागला.तो संन्यासी झाला.पूर्वी त्याने व्यभिचाराला धिकृत केले होते.आता वयाच्या सत्तराव्या वर्षी तो लोकांना संपूर्णपणे ब्रह्मचारी राहावे' असे शिकवू लागला. 'जो कोणी एखाद्या स्त्रीचा स्वतःच्या पत्नीचाही विषयबुद्धीने विचार करील.त्याने तिजशी व्यभिचार केल्यासारखेच आहे.' आपल्या क्षीण इच्छांनुसार जगाची पुनर्रचना करू पाहणाऱ्या वृद्धाचे दर्शन एक प्रकारे करुणास्पद असते.अशा वृद्धाला पाहून त्याची कीव येते. 'संपूर्ण ब्रह्मचर्य पाळल्यामुळे मानवजात नष्ट झाली तरी हरकत नाही' असे तो म्हणे! पण त्या वेळी त्याची बुद्धी व त्याचे मन त्याला हळूहळू सोडून जाऊ लागली होती. त्याचा गूढवाद त्याच्या बुद्धीला संपूर्णपणे ग्रासू पाहत होता. 'रिसरेक्शन' (पुनरुद्धार) या आपल्या शेवटच्या कादंबरीत तो एका पाप्याच्या शरीरात संताचा आत्मा घालतो.या कादंबरीतला नायक नेखलडोव्ह आरंभी दुष्ट व पापी असतो; पण शेवटी हुतात्मा होतो. शत्याच्या जीवनात आकस्मिक क्रांती होते व थोडक्याच वर्षांत तो एकदम पाप्याचा संत होतो.पाप-शिरोमणीची पुण्यमूर्ती होते ! अपूर्व बुद्धीच्या टॉलस्टॉयला जी स्थिती गाठण्यासाठी जीवनात धडपडावे लागले, ती हा पापात्मा थोड्याशा अवधीतच मिळवतो !


रिसरेक्शन ही कादंबरी म्हणजे जगातील अत्यंत सुंदर व करुण काव्यापैकी एक आहे.पण ती एका वृद्धाची कृती आहे.(मानवजातीची कथा,हेन्री थॉमस,सानेगुरुजी अनुवादित)टॉलस्टॉयला स्वतःचा मोठेपणा पाहावयास मिळाल्यानंतरही बराच काळ तो जगला. आयुष्याच्या अखेरच्या दहा वर्षांत तो राजकीय, सामाजिक व नैतिक ध्येये उपदेशीत होता.पण ती ध्येये या मर्त्य लोकी कशी अंमलात येणार? ज्या जगात अतिमानुष लोक असतील,

त्यातच ती मूर्त होण्याची शक्यता.तो वृद्ध होत चालला तसतसा तो अधिकाधिक गहन,गंभीर तत्त्वज्ञानी व बालकाप्रमाणे साधा होत गेला. १९१० सालच्या ऑक्टोबरच्या अठ्ठाविसाव्या तारखेस तो घर सोडून बाहेर पडला,तेव्हा त्याचे वय ब्याऐंशी वर्षांचे होते.त्याच्या अंगात शेतकऱ्याचे कुडते असे.त्याच्या चेहऱ्यावर वार्धक्यामुळे सुरकुत्या व वेदनांमुळे आठ्या पडल्या होत्या, त्याची मुद्रा सौम्य;पण करुण व शांत होती. बुद्धाप्रमाणे परिव्राजक होऊन जगाच्या राजमार्गाने तो फिरत होता.


बुद्धाने जीवन मिळावे म्हणून घराचा त्याग केला होता,तर टॉलस्टॉय जणू मरण मिळावे म्हणून घराबाहेर पडला होता.


एकटेच कोठेतरी मरून पडावे,आसपास कोणी नको,असे त्याला वाटले.त्यांनी सारे जीवन दुसऱ्यांवर दया करण्यात घालवले,पण तो मात्र घरच्यांची दया सोडून पळून गेला! कित्येक दिवस तो गावोगाव भटकत होता.शेवटी एके दिवशी तो जो रस्त्याच्या कडेला पडला,तो पुन्हा उठलाच नाही! एक डॉक्टर त्याच्यापाशी आला. त्याला तो म्हणाला,पृथ्वीवर लाखो लोक दुःखी व आजारी आहेत.

मग तुम्ही फक्त माझाच विचार का करता? १९१० सालच्या नोव्हेंबरच्या विसाव्या तारखेस जी शांती तो आयुष्यभर मिळवू पाहत होता,ती त्याला मिळाली.

नुकतेच सहा वाजले होते व त्याचे दुःखभन्न शरीर शांत झाले. 'शेवटचा महामोक्ष' त्याला मिळाला. 'मृत्यू', 'धन्यतम मृत्यू' त्याला मिळाला.याच शब्दांनी त्याने मृत्यूला गौरविले होते.जग सुसंस्कृत व युद्धहीन व्हावे यासाठी त्याने जीवन खर्चले;पण त्याच्या मृत्यूनंतर चार वर्षांत सारे जग भीषण व रानटी अशा एका महायुद्धात बुडून गेले !


०४.०५.२४ या लेखातील पुढील भाग..

४/५/२४

प्रेम देणारा टॉलस्टॉय Tolstoy the Giver of Love

लिंकनने मोठेपणा कसा मिळवला,हे पाहणेच मोठे कौतुकाचे आहे.पण टॉलस्टॉयने आपला मोठेपणा कसा फेकून दिला.त्याचा कसा त्याग केला हे पाहणे अधिक कौतुकाचे आहे. 


लिंकन धीरोदात्त धैर्यामुळे श्रेष्ठ पुरुष झाला,तर टॉलस्टॉय आपल्या अनंत प्रेमामुळे व सौजन्यामुळे आपले प्रतिष्ठित स्थान सोडून बहुजन समाजात जाऊन बसला.


बुद्धाप्रमाणेच टॉलस्टॉयही मोठ्या व श्रीमंत सरदार घराण्यात जन्मला होता.त्याच्या पूर्वजांपैकी एक जण पीटर दि ग्रेटचा मित्र होता.तो यास्नाया पोलिआना (म्हणजे प्रकाशमय दरी) येथे १८२८ साली जन्मला. वयाच्या दुसऱ्या वर्षी त्याची आई वारली,नवव्या वर्षी वडील वारले.त्याला दोन भाऊ होते व दोन बहिणी होत्या.

ही सारी भावंडे दूरच्या एका आत्याच्या ताब्यात देण्यात आली.तिचे नाव टाशिआना. तिच्या ठायी अत्यंत थोर असे दोन सद्गुण होते.प्रेम व गांभीर्यवृत्ती हे सुध्दा मोठ्या प्रमाणात होते.येणाऱ्या-जाणाऱ्या भोळसट यात्रेकरूंशी फार एकरूप होण्याचा दुबळेपणाही तिच्या ठायी होता.ती त्यांना साधुसंत मानी,गूढवादी मानी.


हे यात्रेकरू अनेक गोष्टी सांगत.टॉलस्टॉयच्या मनावर या गोष्टींचा खूप परिणाम होई.त्याला लागलेली अध्यात्म

ज्ञानाची गोडी कधीही सुटली नाही.तो दिवसाढवळ्याही जणू स्वप्नात रमे,गूढ चिंतनात मग्न होई! त्याच्या या वृत्तीमुळे त्याची तीव्र बुद्धी कधीकधी झाकोळली जाई.तो एकोणिसाव्या शतकातला अतिश्रेष्ठ महामती होता.पण त्याच्या गूढ गुंजनामुळे त्याच्या मतीचे तेज कमी होई.तो शाळेत मथ्थड होता.शाळेतील शिक्षक तो व त्याचे दोन भाऊ यांच्याविषयी नेहमी म्हणत की, 'सर्जियसच्या ठायी खूप काम करण्याची इच्छा आहे व कर्तबगारी आहे. डिमिटीला करण्याची इच्छा आहे.पण क्षमता नाही व लिओला काही करण्याची इच्छाही नाही व पात्रताही नाही!' पण जीवनाविषयी त्याची सहसा फारशी कोठे न आढळणारी अत्यंत गंभीर दृष्टी होती.वयाच्या पाचव्या वर्षीच तो अशा निर्णयाला आला की, 'जीवन करमणुकीसाठी नव्हे; तर फार मोठ्या जबाबदारीसाठी मिळालेले आहे.' वयाच्या सोळाव्या वर्षीच त्याची सनातन धर्मावरची श्रद्धा उडाली व त्याने तात्त्विक परिभ्रमण सुरू केले.तारुण्याच्या वनातून तो तत्त्वज्ञानासाठी हिंडत-फिरत होता.प्रयोग करीत होता.मूळच्या धार्मिक श्रद्धेतून तो अज्ञेयवादाकडे गेला व अज्ञेयवादातून बौद्धिक शून्यवादाला पोहोचला.(कशावरच त्याची श्रद्धा राहिली नाही.) शेवटी तो निराश झाला. तेव्हा त्याचे वय एकोणीस वर्षांचे होते.


तो दिसण्यास कुरूप होता.त्यामुळे त्याला असमाधान वाटे.त्याच्या दुःखाचे हेही एक कारण होते.लोकांनी आपले कौतुक करावे,आपली वाहवा करावी असे त्याला फार वाटे.तो आपल्या डायरीत लिहितो, 'मी सर्वांना माहीत व्हावा, सर्वांनी मजवर प्रेम करावे, असे मला नेहमी वाटे.' पण आपणासारख्या सौंदर्यहीनास जगात सुख लाभणे शक्य नाही हे तो जाणून होता. त्याचे तोंड खरोखरच गोरिलाच्या तोंडासारखे होते.बारीक खोल गेलेले डोळे,

आत गेलेले खोल कपाळ,जाड ओठ,भले मोठे नाक,

लांबलचक व मोठे कान अशी त्याची मूर्ती होती.त्याचे शरीर कॅलिबन नावाच्या भूताचे होते.. पण त्या शरीरातील मन एरीअलच्या मनासारखे दैवी होते. आपण कुरूप असल्याची जाणीव नष्ट व्हावी म्हणून त्याने आत्महत्या करण्याचेही ठरवले.पण सुदैवाने त्याचे मन पालटले व स्वच्छंदपणे विलासी जीवन कंठून विरंगुळा मिळवण्यासाठी तो निघाला.मृत्यूने कायमची विस्मृती मिळवण्याऐवजी सुखविलासाने तो आपणास तात्पुरती विस्मृती पाडू इच्छीत होता.


आणि असे चालले असता,एके दिवशी रूसो त्याच्या हातात आला.त्याला रूसोचा शोध लागला.हा शोध म्हणजे त्याला त्या वेळी अत्यंत आवश्यक असे टॉनिकच होते.रूसो भेटल्यावर स्वतःच्या कुरूपतेबाबत त्याला दुःख वाटेनासे झाले व निसर्गाच्या सौंदर्याकडे त्याची दृष्टी वळली.चर्चच्या धर्माचा त्याग करून तो रूसोच्या धर्माचा उपासक झाला.टॉलस्टॉय रूसोची देवाप्रमाणे पूजा करू लागला.रूसोची लहानशी प्रतिमा करून साधूसंतांच्या मूर्तीप्रमाणे तो ती गळ्यात घालू लागला.रूसोच्या तत्त्वज्ञानाने संस्फूर्त होऊन त्याने 'रशियन जमीनदार' ही आपली पहिली कादंबरी लिहिली.त्याला जन्मभर पुरून उरलेला प्रश्नच त्याने या कादंबरीत मांडला आहे.थोर प्रेषितांचे ध्येय व बहुजन समाजाची त्याबाबतची उदासीनता हा तो प्रश्न होय. नेखलडोव्ह नामक एक बडा जमीनदार या कादंबरीचा नायक आहे.तो विद्यापीठातील शिक्षण सोडून शेतकऱ्यांच्या साह्यासाठी म्हणून जातो.. पण हे सारे शेतकरी कर्तृत्वहीन अशा सर्वसाधारण लोकांप्रमाणेच असतात.ते स्वतः काहीच करू शकत नाहीत.'आपले नशीब' असे म्हणत ते पडून राहतात व आपल्या चाकोरीतून बाहेर पडण्याची इच्छाच त्यांना होत नाही. आपणास झोडपणारा धनी ते जाणू शकतात. पण दया दाखवणाऱ्या धन्याशी कसे वागायचे,हे त्यांना समजत नाही.असला कसला हा मालक?' असेच जणू त्यांना वाटत असते.हे त्याच्यापासून दूर राहतात. 'असा कसा हा बावळट?' असे म्हणून त्याची थट्टा,टिंगल करतात.त्याने देऊ केलेल्या मदतीकडे ते साशंकतेने पाहतात.त्याच्याकडे ते फसव्या,लफंग्या,हेरगिरी करणारा, दुष्ट,शठ,मूर्ख अशा अनेक दृष्टींनी पाहतात.पण आपला मित्र होऊ पाहणारा,

आपला मित्र होण्यासाठी धडपडणारा हा धनी आहे,हे त्यांच्या ध्यानात येत नाही.नेखलडोव्ह निराश होतो. तो पियानो वाजवत बसतो;पण त्याला संगीताची देणगी नसते.त्याच्या बोटांना जे गाणे वाजविता येत नाही ते त्याची प्रतिमा,त्याची कल्पनाशक्ती शब्दांत गुंफते.तो संगीत ऐकतो.अनेक भूतकालीन व भविष्यकालीन संमीलित ध्वनी एकमेकांत मिसळून जातात.त्याचे स्वप्न पूर्ण होते,विजयाने नटते.तो आपल्या मनःचक्षूसमोर स्वप्नसृष्टीत ते शेतकरी पाहतो. 


त्यांची ती दुर्दशा व त्यांचे ते भिकारडे जीवनच त्याला दिसते असे नव्हे,तर त्या शेतकऱ्यांतील प्रेमळपणाही त्याला दिसतो.किती सुंदर व साधे ते जीवन ! शेतकऱ्यांतील जे जे चांगले, ते ते त्याच्या दृष्टीला दिसते.त्या शेतकऱ्यांच्या अज्ञानाची,आळसाची,

हट्टीपणाची,दंभाची व अविश्वासाची तो त्यांना क्षमा करतो.कारण,तो आता त्यांच्याकडे पाहत नसून त्यांच्या आत पाहतो.जणू त्यांच्या जीवनात, हृदयात शिरतो.त्यांच्या हालअपेष्टा,त्याची अनंत सहनशक्ती,त्यांचा आनंद,दया,उत्साह,जे-जे नशिबी असेल, ते-ते जीवनात शांतपणे स्वीकारणे,मृत्यूसमोरही धैर्याने व शांतपणे उभे राहणे हे सारे आता त्याला दिसू लागते.तो गुणगुणतो "खरोखरच सुंदर आहे हे शेतकऱ्यांचे सरळ,निर्दोष व निष्पाप जीवन! किती साधे व किती गोड,किती सेवामय व किती कर्ममय !" त्याने देऊ केलेली मदत ते नाकारीत. त्यामुळे त्याला वाईट वाटे.पण आता त्याला सारे समजू लागले व समजू लागल्यामुळे त्याला सहानुभूतीही वाटू लागली.कारण ते सारे भाऊच होते.तो व ते शेतकरी एकरूपच होते. एकाच हाडामांसाचे,एकाच रक्ताचे,निर्दय भवितव्यतेच्या प्रहाराखाली जगणारे,

श्रमणारे, मरणारे असेच ते सारे अगतिक जीव नव्हते का? भवितव्यताच मालक,तीच जमीनदार! हे दैव सर्वांना नाचवीत आहे,रडवीत आहे,नष्ट करीत आहे.सारेच दैवाच्या हाती ! सारेच दैवाचे दास !!


१८५१ साली टॉलस्टॉय पैसे उधळून बसला होता.

सावकारांचा ससेमिरा चुकविण्यासाठी तो कॉकेशसमध्ये पळून गेला व सैन्यात दाखल झाला.त्याचा भाऊ आधीच तिथे अंमलदार झाला होता.एकोणिसाव्या वर्षी तो आत्महत्या करू इच्छित होता.पण आता तेविसाव्या वर्षी तो जीवनावर पूर्ण भरवसा ठेवणारा झाला होता.तो जीवनाला मिठी मारून बसला होता.

तात्त्विक संशय पिशाचे त्याने पिटाळून लावली.मानगुटीला बसणारी पापाची भीती त्याने झुगारून दिली.तो पुन्हा एकदा गूढवादात व सुंदर स्त्रियांत रमू लागला.तरुण फौस्टप्रमाणे तो जगात वावरू लागतो,जगाला नाकारण्याऐवजी त्याचे स्वागत करतो.हे जग एकंदरीत बरे व करमणूक करणारे खेळणे आहे,असे त्याला वाटू लागते. सुखात भर घालणारा प्रत्येक अनुभव त्याला चांगला वाटू लागतो. आपल्या 'कोसॅक्स' या कादंबरीत तो लिहितो,'काहीही वाईट नसते.एखाद्या सुंदर मुलीच्या संगतीत करमणूक करून घेण्यात काय पाप आहे? उलट,ते आरोग्याचे निकोप आणि निरोगी प्रकृतीचे लक्षण होय.'पर्वतांच्या सौंदर्यात तो रंगला,तन्मय झाला.तो लढला व जुगार खेळला.त्याने प्रेमप्रकारही केले आणि अत्यंत काव्यमय;पण यथार्थदर्शन घडवणाऱ्या अप्रतिम कादंबऱ्या त्याने लिहिल्या.त्याने नानाविध साहित्य निर्माण केले बाल्यातील गोष्टी,मुलांच्या गोष्टी,युद्धातील कथा,कोसॅक्स लोकांवरील कादंबऱ्या,निबंध,पत्रे असा प्रचंड वाङ्मयप्रवाह त्याच्या बहुप्रसव,प्रतापी व प्रतिभासंपन्न लेखणीतून जोराने व भव्यतेने वाहू लागला.वाङ्मयातच विलीन होऊ लागल्यामुळे लष्करी कर्तव्यात व शिस्तीत त्याचे नीट लक्ष नसे.तो निर्मितीचा भक्त होता.

विनाशाचा नव्हता,जरी त्याला अद्यापि लष्करी गणवेशाचा अभिमान वाटत होता.जरी ती सुंदर पदके व चकचकीत बटणे त्याला आवडत,तरी युद्धाचे खरे स्वरूप त्याच्या लक्षात येऊ लागले होते. वयाच्या चोविसाव्या वर्षी त्याने 'स्वारी' ही कादंबरी लिहिली लष्करशाहीविरुद्ध त्याने केलेली ही पहिली निर्भय घोषणा.तीत तो लिहितो, 'या जगात शांततेने राहणे अशक्यच आहे काय? हे जग किती सुंदर आहे! बर अनंत तारांकित आकाश! असे सुंदर आकाश व अशी रमणीय धरणी यांच्यामध्ये राहून या मानवांच्या मनात द्वेष व मत्सर राहतात तरी कसे? निसर्गाचा स्पर्श होताच खरोखरी मानवी हृदयातील सारी दुष्टता,सारी कटुता,वितळून जावी,अदृश्य व्हावी,'सत्यं शिवं सुंदरम'चे अत्यंत जवळचे रूप,त्याचा साक्षात्कार म्हणजे हे निसर्ग-दर्शन होय.त्याने आपण स्वतः नको का प्रेमळ व सुंदर व्हायला- निष्पाप व्हायला?'


अद्यापि त्याने प्रत्यक्ष युद्ध पाहिले नव्हते. लुटुपुटीच्या लढाया व हालचालीच त्याने पाहिल्या होत्या.युद्धाचे प्रतिबिंब,युद्धाची नक्कल त्याने पाहिली असली तरी अस्सल युद्ध त्याने पाहिले नव्हते.ते पाहण्याची वेळ

आली.१८५३ साली रशियाने तुर्कस्तानविरुद्ध युद्ध पुकारले, 'झारच्या महान वैभवासाठी तुम्हीही आपणास करता येईल ते थोडेफार करा.' असे टॉलस्टॉयला सांगण्यात आले.प्रथम देशभक्तीच्या भावनेने तोही वाहवून गेला.इतर रशियन तरुणां-

प्रमाणे तोही एकदम भीषण झाला, क्रूर झाला. त्याच्यावरून जणू एक प्रकारची रानटी; पण धार्मिक उत्साहाची लाटच गेली! बालपणीच्या गूढगुंजनाकडे तो पुन्हा वळला.तो तुकांना मारीत होता व ईश्वराशी बोलत होता.रशियनांवर ईश्वराची कृपा होती व तुर्कावर त्याचा कोप होता.यासाठी तो ईश्वराची प्रार्थना करी,प्रभूचे आभार मानी.संकटकाळी देवाने आपले प्राण वाचवले म्हणून तर तो फारच कृतज्ञता प्रकट करी.युद्धाच्या ऐन गर्दीतही काहीतरी मोठ्या कामासाठी ईश्वर आपणास वाचवीत आहे,असे त्याला वाटे. सा गूढ अनुभव त्याला येई. 

१८५५ सालच्या मार्चच्या पाचव्या तारखेस तो डायरीत लिहितो -


'एक महान विचार माझ्या मनात आला आहे.त्या विचाराच्या साक्षात्कारार्थ मी आपले सारे जीवन देईन असे मला वाटते. मी आपले जीवन त्या ध्येयार्थ देऊ शकेन. कोणता हा विचार? कोणते हे नवीन ध्येय? नव्या धर्माचा पाया घालण्याचा विचार मला स्फुरला आहे...'


कोणता हा धर्म? अप्रतिकाराचा,आंतरराष्ट्रीय बंधुतेचा,

शांततेचा.पण हा महान विचार मनात डोकावत असताच एकीकडे तो तुर्वांना कंठस्नान घालीत होता.कारण झारची तशी आज्ञा होती. पण लवकरच त्याला या खाटिकखान्याचा वीट आला.क्रिमियन युद्धाच्या काळात त्याने तीन पुस्तके लिहिली.पहिले देशभक्तीने ओतप्रोत भरलेले आहे.दुसऱ्यांत 'मानवा'ने एकमेकांचा संहार करण्याबाबत तो लिहितो.


पण तिसऱ्याच्या प्रस्तावनेत आपल्या प्रजेला तोफांचा चारा करणाऱ्या शास्त्यांचा त्याने धिक्कार केला आहे. तो युद्धाकडे जितके-जितके अधिक पाहत राहिला,तितके-तितके युद्धाचे अधिक यथार्थ दर्शन त्याला झाले.


उर्वरित राहिलेला भाग ०६.०५.२४ या पुढील लेखमालेत..