* विजय गायकवाड | Vijay Gaikawad

live

नमस्कार आपले स्वागत आहे. मी पुस्तके आणि मित्रांवर पैसे खर्च करतो,माझ्याकडे दगड आणि विटांवर खर्च करण्यासाठी पैसे नाहीत.- रस्किन बाँड.ही थोर माणसं व त्यांचे विचार मला पुस्तकात भेटलीत.ती भेटली आणि त्यांनी सांगितले कि, प्रत्येक दिवशी असं काही तरी करा की,ते तुम्हाला अधिक सुंदर उद्याच्या दिशेने खूप लांबवर घेऊन जाईल."- डोग फायरबाऊ.' सर्वियन कादंबरीकार मिलोराद पावीच यांचे एक वाक्य आहे ते म्हणतात - जोवर जगात पुस्तक वाचणाऱ्या वाचकांची संख्या बंदूकधारी सैनिका पेक्षा अधिक आहे तोवर काळजीच काहीच कारण नाही.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात.पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये.म्हणून अविरतपणे प्रयत्न करणारे मार्गदर्शक, मित्र धावून येतात.प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,डॉ.दीपक शेटे,आ.भरत बुटाले,प्रा.सर्जेराव राऊत,सुभाष ढगे,अनिल फारणे,डॉ.सुधीर सरवदे ,विश्वास खाडे, विनायक पाटील,संजय कुंभार,सतीश खाडे,मनोहर सुर्वे,गणेश खंदारे,तात्या गाडेकर, दादासाहेब गाडेकर, दादासाहेब ताजणे, पुस्तकातील घटना प्रसंग सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील यांनी केलेले आहे. मला लिहिण्याची प्रेरणा देणारी पुस्तके,लेखक,प्रकाशक,मित्र ही जगावेगळी माणसं माझ्या जीवनातील महत्वाचा टप्पा आहेत.... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ.मेघा गायकवाड, चिरंजीव मयान,माझ्या धावण्यातील गुरुवर्य नामदेव बरुरे,लुल्ला शेख मोठी ताई ,लहान ताई जयश्री शिंदे या सर्वांचेच मनापासून आभार व धन्यवाद मॅट्रिक फेल विजय गायकवाड

८/५/२५

अंजन  / Anjan

" तूपण किती चुटकीसरशी मदत करायचास मला. मी जागेवरून उठायच्या आधी मला हवी ती वस्तू कपाटातून काढून हातात द्यायचास.एवढ्या लहानपणी किती समंजस होतास.." आईनं चिन्याचं कौतुक केलं.


"तुम्ही तरी काय कमी कष्ट उपसलेत;घरच्या चार माणसांसोबत चाळीतल्या १० माणसांचं डबं सकाळी ८ वाजता तयार असायचं.पहाटे पाच वाजता स्टोव्ह सुरू झाल्यापासून तुमचं काम सुरू व्हायचं आणि रात्री ११.३० वाजता अंथरुणावर पाठ टेकायचा.खानावळीचं डबं,पोरांची शाळा, दुपारी भाज्यांची निटवाट करून परत संध्याकाळची तयारी.रविवारी सुट्टीच्या दिवशी तर डब्यांच्या लोकांना मटणाचा स्वयंपाक.किती कष्टानं शिकवलं आहे पोरांना.

चाळीतल्या दोन खोल्यांत दाटीवाटीत काटकसरीनं दिवस काढले म्हणून चाळीतनं फ्लॅटमधे पोहोचलात..." बोलता बोलता जोंधळेकर काकू भावूक झाल्या.


"रमेशनं नोकरी मिळताच इथं फ्लॅट घेतला.नाही तर गिरण्या बंद होत चाललेल्या.यांच्या रिटायरमेंटनंतर मुंबईत खोलीभाडं द्यायचं वांदं झालं असतं.पोरानं धाडस करून घर घेतलं म्हणून बरं झालं.यांचा फंड तर पोरीच्या लग्नात खर्च झाला.

उरलेल्या पैशात जगणं मुश्किल होतं.रमेशला चांगली नोकरी मिळाली म्हणून बरं झालं..." आईनं समाधान व्यक्त केलं.


"कितीला भेटला हा फ्लॅट तुम्हाला?" चिंतामणीनं विचारलं.


"त्यावेळी ३५ लाख रुपये बसले.बाबांनी फंडातील पैशात डाऊन पेमेंट दिलं.उरलेल्या रकमेचं कर्ज घेतलं..." रमेशनं सांगितलं.


"बरं झालं बाबा.निदान निवारातरी झाला..." जोंधळेकर काकू म्हणाल्या.


"हे घे थालीपीठ.तुला आवडतं ना माझ्या हातचं?" असं म्हणत आईनं चिन्याला आणि जोंधळेकर काकूंना दोन दोन थालीपीठं दिली.


"तुम्ही नाही घेतलं?"


चिंतामणी.


"आमचं आताच खाऊन झालंय.तोवर तुम्ही आला..." बाबा म्हणाले.


रमेश आत गेला.आता पिझ्झा आला तर यांच्यासमोर खाताना सगळ्यांना द्यायला लागणार म्हणून देविकानं आणखीन दोन मागविता का म्हणून विचारलं,तर आतापर्यंत तो मुलगा बाहेर पडला असेल.असं रमेश म्हणाला.दोघांची आत कुजबूज चालू होती.तोवर पुन्हा बेल वाजली म्हणून रमेश पैसे हातात घेऊनच दारात गेला.पिझ्झाचा बॉक्स बघताच मुलांनी दंगा चालू केला.


रमेशनं पिझ्झा आत किचन कट्टयावर ठेवला आणि चिन्याला विचारलं,"तू खाणार का रे पिझ्झा?"


"नको नको,आज काकूच्या हातचं थालीपीठ खाऊन घेतो.

पिझ्झा काय कुठंही मिळतो;पण अस्सं थालीपीठ बाहेर कुठंच मिळत नाही."


प्रसंग तिसरा -


सकाळी सकाळी आलेल्या जोंधळेकर काकू चांगल्या तासभर थांबल्या होत्या.जुन्या आठवणी,चाळीतली लोकं,त्यांच्या गमतीशीर आठवणींत आई-बाबा दोघेही रमून गेले.फ्लॅटमध्ये दिवसभर त्यांच्यासोबत बोलायला,गप्पा मारायला कोणी नव्हतं.अनोळखी लोकांना बोलण्यात स्वारस्य नाही आणि ओळखीची मंडळी आपापल्या कामात गुंतलेली.दिवसभर टीव्ही तरी किती वेळ बघणार?


दिवसभर खेळून दमलेली मुलं लवकर झोपली. रमेश नुसताच आडवा पडला होता.देविकानं लाडात रमेशच्या छातीवर हात फिरवत म्हटलं,"मी काय म्हणते..."


"बोल..." रमेश निर्विकारपणे उत्तरला.


"चाळीतल्या गप्पांमध्ये आई-बाबा किती रमून गेले होते ना?"


"हो ना.अर्ध्याहून जास्त आयुष्य जगलेत ते त्या चाळीत.फार मनमिळाऊ लोकं आहेत ती.आम्ही तिथं असताना प्रत्येक दिवस चाळीत जिवंतपणा असायचा आणि सणासमारंभात तर काय विचारूच नकोस.किती धमाल,किती उत्साह,सगळे जणू एकाच कुटुंबातील.थोडेफार वाद व्हायचे;पण जेवढ्यास तेवढे.परत सगळे एकत्र.एकमेकांच्या अडचणींना धावून यायचे."


"इथं त्यांना एकटं एकटं वाटत असेल ना?"


"आपण दिवसभर कामात असतो.घरी त्यांचा दिवस कसा जात असेल माहिती नाही."


"चाळीत पटकन् जाऊन यायचं म्हटलं तरी जाणार किती वेळ आणि थांबणार किती ? पाहुण्यासारखं गेलं की उतरणार कुणाकडं हा प्रश्न आहेच..."


"हो ना.."


"मी काय म्हणते,आपण तिकडं एक खोली भाड्यानं घेऊया का?"


आणि तिथं राहणार कोण ?"


"आपण काय करू,आई-बाबा तिथं रहायला जातील.आपण दर विकेंडला निकडं जाऊ.मग त्यांनापण आपल्या लोकांमध्ये मिसळता येईल आणि तुलापण जुन्या मित्रांना भेटता येईल."


"आहे ना इथं त्यांना एक बेडरूम.मग काय गरज आहे शिफ्ट करायची.इथे या घराचा हप्ता आणि तिकडचं भाडं खर्चपण वाढणार."


"अरे,तुला कळत कसं नाही? त्यांचं तिकडं मन रमेल आणि आपलं इकडे.मुलं मोठी झाली आहेत आता.त्यांना नको का वेगळी रूम ? त्याशिवाय आपल्याला प्रायव्हसी कशी मिळणार?" देविका फारच लाडात आली.


"त्याचा विचार उद्या करू..." असं म्हणत रमेशनं लाईट बंद केली.


दोन दिवसांनंतर देविकानं दुपारनंतर हाफ डे घेतला. तिच्या आईला भेटून खर्चासाठी पैसे द्यायचे होते आणि जाता जाता चाळीतल्या लोकांना भेटून जाऊ म्हणून तिनं रमेशला बोलावून घेतलं.माहेरी चहापाणी आटोपलं;पण तिचा भाऊ अजून कामावरून यायचा होता.त्याला भेटायला थांबलं तर उशीर होईल म्हणून आईला पैसे देऊन दोघं चाळीकडं वळले.


दारातच भाटेकाका भेटले.त्यांच्यासोबत गप्पा मारत मारत आत गेले,तर समोरून गण्याभाऊ आला. जुन्या मित्राला कडकडून मिठी मारली आणि चहाला घरी चल म्हणून आग्रहानं ओढून नेऊ लागला;पण सासुरवाडीत नुकताच चहा प्यायल्यानं रमेश नको म्हणू लागला,तरी गणेशनं आग्रह काही सोडला नाही.


याच्याकडून खोली भाड्यानं मिळेल का याची चौकशी करावी म्हणून देविका म्हणाली,"एवढा आग्रह करतायत भावोजी तर चला ना.चहा तर निमित्तमात्र.पाच-दहा मिनिटं तेवढंच सगळ्यांना भेटता येईल."


घरात गणेशचे वडील टी.व्ही.बघत बसले होते.आई स्वयंपाकात गुंतलेली.एवढ्या दिवसांनी रमेश बायकोला सोबत घेऊन आलाय म्हटल्यावर तिनं चपातीचा तवा उतरला.परात बाजूला सरकवून हात धुतला आणि चहाला पातेलं ठेवलं.


गणेशच्या वडिलांना रमेशची प्रगती बघून भारावून आलं."किती कष्टानं शिकलास.मुळातच लहानपणापासून शांत आणि हुशार.टपोरी पोरांमध्ये मिसळण्यापेक्षा अभ्यासात लक्ष.अतिशय नम्र.कधी कुठल्या भांडणात नाही की कुठलं व्यसन नाही." नवऱ्याची स्तुती ऐकून देविकाचा चेहरा खुलला


गणेशचे वडील आणि रमेशचे वडील एकाच मिलमध्ये कामाला होते;पण रमेश शिकला, इंजिनिअर झाला.मोठ्या पगाराची नोकरी मिळाली. मग त्यानं फ्लॅट घेतला.नंतर लग्न केलं.बायकोपण नोकरी करते दोघं मिळून कमवतात, म्हातारा-म्हातारीला सांभाळतात,याचं त्यांना बरं वाटलं.


मित्राची विचारपूस करून झाल्यावर गणेशचे वडील अधिकारवाणीनं बोलले,"वडिलांना चांगलं संभाळ रे बाबा.

फार कष्ट उपसलेत त्यानं.आम्ही दोघं एकत्रच कामाला होतो.भोंगा वाजला की आम्ही घर गाठणार आणि वेळ जावा म्हणून पत्ते खेळत बसणार.त्यावेळी टी.व्ही. नव्हता;पण तुझा बाप कधी पत्ते खेळायला आला नाही.दिवसांत ८ तास ड्युटी आणि ६-७ तास झोप.अंघोळपाणी, जेवण-खाणं आणि जाणं-येणं यात ३-४ तास. बाकीच्या ४-५ तासांत आम्ही एकतर अंथरुणावर लोळत पडणार,पत्ते खेळत किंवा फिरण्यात टाईप पास करणार.तुझा बाप मात्र एकतर ओव्हर टाईम करणार किंवा रिक्षा चालविणार.दरवर्षी उन्हाळ्यात आम्ही सगळे सहलीला मुंबईबाहेर जायचो,तर तुझा बाप तुझ्या आईला दरवर्षी सिद्धिविनायक मंदिरात घेऊन जायचा.

ती खानावळ चालवायची आणि हा रिक्षा.पै पै करून पैसे साठवून तुम्हाला शाळेला पाठवलं.आमची पोरं पैसे नाहीत म्हणून आर्टस्ला गेली आणि तुला मात्र त्यांनी इंजिनिअर केला. देवानंपण त्यांच्या कष्टाचं फळ दिलं आणि तुला नोकरी मिळाली.जन्मभर त्यांनी फार कष्ट उपसलेत रे बाबा.ना कुठली हौस केली ना कधी व्यसन केलं. लेकीचं लग्न आणि तुझं शिक्षण हीच त्यांची कमाई म्हणून ते चाळीतून फ्लॅटमध्ये गेले आणि आम्ही इथंच खितपत पडलोय.आमची पोरंपण शिकली नाहीत आणि आम्हीपण त्यांच्यासाठी खर्च केला नाही.तू हुशारपण आहेस आणि नशिबवानपण. म्हणून असे आई-बाप मिळाले तुला..."


काकांनी डोळ्यांत अंजन घातल्यामुळं रमेशला आई-बाबांनी केलेल्या कष्टाची चांगलीच उजळणी झाली.देविकालाही तिच्या आई-बाबांचं कष्ट आठवलं.लहानपणापासून बऱ्याच गोष्टी डोळ्यांसमोर घडल्या;पण काळाच्या पडद्याआड सगळ्या विस्मृतीत गेलेल्या.गणेशच्या वडिलांच्या आणि रमेशच्या वडिलांच्या वागण्यातील फरक यांमुळे आज रमेशला वडिलांविषयी आदर द्विगुणित झाला.वडिलांच्या कष्टाची चित्रफीत डोळ्यांसमोरून फिरत असतानाच रमेश घरी पोहोचला आणि फार दिवसांनी बाबांना घट्ट मिठी मारून ढसाढसा रडायला लागला...

६/५/२५

अंजन  / Anjan

सकाळचं साडेसात वाजून गेलं तरी देविकाचं आटोपलं नाही.७.५० ची लोकल पकडली तरच ऑफिसला वेळेत पोहोचणार,नाही तर लेट मार्क, पगारात कपात ठरलेलीच.

वरून सगळ्यांच्या समोर साहेबांची बोलणी खावी लागणार ते वेगळंच. शिवाय नंतरच्या गाड्यांना गर्दी फार अन् त्या गाडीत ओळखीचंपण कोणी नसतं.


दीड तासांचा कंटाळवाणा प्रवास.नेहमीच्या गाडीनं गेलं की कसं, आधीच्या स्टेशनवरून येणाऱ्या मैत्रिणी जागा पकडतात.निवांत बसून गप्पा मारत जाता येतं.आज उठायला जरा उशीर झाला,तर सगळी कामं मागं आली.घड्याळाचा

काटा काही थांबायला तयार नव्हता.पोरांची आवराआवरही सुरूच होती.


घाईतच देविकानं नवऱ्याला सांगितलं,"रमेश, उठायला उशीर झाल्यामुळं मी आज काही बनवलेलं नाही.जाता जाता पोरांच्या टिफीनमध्ये बेकरीतलं काहीतरी खाऊ घेऊन दे.तूपण ऑफिसमध्ये पार्सल मागव."


"ते ठीक आहे; पण आई-बाबांचं काय?" रमेशनं प्रश्न केला.


"आई बनवतील ना त्यांच्यासाठी काहीतरी ? देविका सहजच बोलून गेली.


"आणि तुझ्या टिफीनचं काय?"


"अरे,आज आमच्या ऑफिसमध्ये एकाचा वाढदिवस आहे.तो मागवणार आहे काहीतरी."


"अगं, तू आज उशिरा उठणार होतीस तर मला नाही का सांगायचंस.नाष्टा बनविला तेव्हाच स्वयंपाकपण करून गेले असते मंदिरात." रमेशची आई म्हणाली.


"जायच्या अगोदर दिसलं नव्हतं का मी उठले नाही ते.काय जायचं असतं रोज मंदिरात ?एखाद्या दिवशी नाही गेलं किंवा थोडं उशिरा गेलं तर देव घेणार नाही का आत?" खांद्यावर ओढणी टाकत बाहेर पडताना देविकानं तावातावानंच उत्तर दिलं.


"अगं पण..." सासू काहीतरी बोलणार तितक्यात देविकानं खाडकन् दरवाजा ओढून घेतला आणि बाहेर पडली.


आईनं रमेशच्या तोंडाकडं बघितलं,तर तो नाष्टा करत करत बोलला,"तुला माहिती आहे ना आई, दिवसभर ऑफिसमध्ये किती काम असतं बिचारीला.एवढ्या मोठ्या खासगी विमा कंपनीत मॅनेजर म्हणून काम करताना किती त्रास होतो ते तुला नाही कळणार.झोपली एखाद्या दिवशी उशिरापर्यंत ती तर नाष्टा बनवलास तेव्हा बनवूनच जायचंस ना जेवण ?"


नाष्टा संपवून रमेश मुलांच्या खोलीत गेला.रिकामे दोन टिफीन त्यांच्या बॅगेत ठेवले.कपडे बदलून बाहेर आला तरी मुलं अजून बुटांची लेस बांधत होती म्हणून त्यांच्यावर खेकसला,"चला ना पटकन् उशीर होतोय मला.आज बेकरीतपण थांबायला लागणार आहे."


तोपर्यंत हातात काहीतरी घेऊन आलेल्या आईनं विचारलं,"संध्याकाळी तू किती वाजेपर्यंत येशील?"


"महिनाअखेरची कामं सुरू आहेत.उशीर होईल यायला.काही काम आहे का?"


"काही नाही रे,तुझ्या बाबांचा हा चष्मा तुटलाय. तेवढा दुरुस्त करून आणशील का येताना?" हात पुढे करीत आईनं विचारलं.


"आई,आताच सांगितलं ना महिनाअखेर आहे म्हणून? आता थोडी कडकी आहे.बघू पुढच्या महिन्यात..." वैतागलेल्या रमेशनं सांगितलं.


"अरे पण चष्मा नाही वापरला तर त्यांना खूप कमी दिसतं,ठेच लागून कुठंतरी पडतील आणि नंबर बदलेल म्हणून म्हटलं."


"आठ दिवसांत नंबरात असा किती बदल होणार आहे,आणू पुढच्या आठवड्यात.नाहीतरी पेपर वाचण्यापलीकडं काय काम आहे त्यांना ? चार दिवस नाही वाचला तर कुठं बिघडतं?"


सोफ्यावर बसून वर्तमानपत्रात तोंड खुपसून चाचपटत बसलेल्या वडिलांकडे बघत रमेश बोलून गेला.


"अरे पण..." आई पुढं बोलणार इतक्यात बाबांनी तिच्याकडं बघितलं आणि डोळ्यांनी खुणावत शांत बसायला सांगितलं.त्या खुणेन आईनं तोंडातले शब्द गिळले आणि रमेश मुलांना घेऊन निघून गेला.


प्रसंग दुसरा


आज रविवार असल्यानं रमेश अजून अंथरुणावर लोळत पडला होता.पोरंही उठायचं नाव घेत नव्हती.


देविका नुकतीच उठून तोंडात ब्रश धरून गॅलरीत उभा होती.आईनं हाक मारली,"रमेश, उठ की रे आता.घड्याळात बघ साडेनऊ वाजून गेलेत..."


आईच्या आवाजानं रमेश उठला आणि डोळं चोळत बाहेर आला."काय हे आई,आज सुट्टी आहे ना? आजतरी निवांत झोपू द्यायचं."


"अरे बाबा,आज कामाला सुट्टी आहे.पोटाला सुट्टी आहे का ? गरमागरम नाष्टा कर आणि मग झोप."


"काय बनवलंय आज?"


"थालीपीठ केलंय,आवडतं ना तुला!"


"रमेश,आज मला पिझ्झा खायचा आहे.जरा फोन करून ऑर्डर कर ना." ब्रश केल्यानंतर तोंड पुसत आलेल्या देविकानं लाडात सांगितलं.


तोवर आतून मुलंपण ओरडली, "अरे वा,पिझ्झा... मला पण.. मला पण.."


"ठिक आहे मागवतो;पण तुम्ही पटकन् आवरा." असं म्हणत रमेशनं फोन उचलला.मुलं उड्या मारत आत गेली.देविकानं पांघरुणाच्या घड्या घातल्या आणि चहाचा कप घेऊन गॅलरीत पेपर वाचत बसली.


थोड्या वेळानं बेल वाजली म्हणून बाथरूममधून बाहेर आलेल्या रमेशनं आवाज दिला,"देविका, उघड गं दार,बघ पिझ्झा आला असेल..."


गडबडीत जाऊन देविकानं दार उघडलं.समोर बघते तर काय,सारा भ्रमनिरास झाला. दारात जोंधळेकर काकू आणि त्यांचा नातू चिंतामणीला बघताच देविकाच्या चेहऱ्यावरील आनंदी छटा उतरली. जुन्या मैत्रिणीला भेटायला आलेल्या काकूंना तोंडात मारल्यासारखं झालं म्हणून काकूनी विचारलं,"दुसरं कोणी अपेक्षित हो काय ?"


"नाही नाही.असं काही नाही.या ना या..." देविकानं लगेच चेहऱ्यावरच भाव बदलला.


"वहिनी आहेत ना घरी?"


"आहेत की. या ना आत..." असं म्हणत देविका मागं सरकली.जोंधळेकर काकूंना दारात उभा बघताच आईनं आतून हाक मारली, "ये गं,अशी बाहेर का उभी आहेस ?"


काकू आत आल्या.त्यांच्या नातवानं बाबांना नमस्कार करताच त्याला शेजारी बसवत बाबांनी विचारलं, "काय, कसा आहेस?"


"मजेत..."


"स्वारी आज अचानक इकडे कशी? रस्ता कसा काय चुकली ?"


"काही नाही हो.बाजारात चालले होते.नेहमी बसनं जाते त्यामुळं मधे थांबणं होत नाही.इतक्या नवीन बिल्डिंगा झाल्यात की मला कळंतच नाही कुठं थांबायचं ते.आज हा गाडी घेऊन बरोबर आला. म्हटलं जाता जाता तुम्हाला भेटून जाऊ.बरेच दिवस झालं गाठभेट नाही."


"दिवस कसले महिने म्हणा.बरं झालं आलात.पूर्वी एका चाळीत रहात होतो,तेव्हा रोज दिसणारी माणसं बघायला आता डोळं उतावीळ असतात. येणं-जाणं असल्याशिवाय हालहवाला कळणार कसा? भेटल्यावर तेवढंच समाधान मिळतं.जुन्या आठवणी ताज्या होतात."


"होय ना..." जोंधळेकर काकू म्हणाल्या.


"रमेश,हा बघ चाळीतला आपल्या शेजारचा चिन्या. किती मोठा झालाय.ओळखलंस का?" आईनं विचारलं.


"हो हो, ओळखलं की..."


"नेहमी तुझ्यासोबतच असायचा.रात्री झोपताना त्याची आई त्याला ओढून घेऊन जायची."


वाघीण,प्रतिक पाटील,स्वच्छंद प्रकाशन ,कोल्हापूर


रमेशच्या डोळ्यांसमोर जुन्या आठवणी तरळू लागल्या.

"काकूंच्या हातच्या स्वयंपाकाला चवच तशी आहे.एक एक पदार्थ आठवला की आजही तोंडाला पाणी सुटतं." असं म्हणत चिंतामणी हसला.


शिल्लक राहिलेला भाग पुढील लेखामध्ये..। 

४/५/२५

डॉ.सालिम अलींच्या सहवासात Dr.In the company of Salim Ali

जगद्विख्यात पक्षिशास्त्रज्ञ डॉ.सालिम अली यांना मी नावानं कोईमतूरला फॉरेस्ट कॉलेजमध्ये १९५८ सालापासून ओळखत होतो.जंगलातील भटकंतीत मी त्यांचं जगप्रसिद्ध पुस्तक 'दि बुक ऑफ इंडियन बर्ड्स' पक्षी ओळखण्यासाठी वापरीत असे.


१९६० साली मी पुणे जिल्ह्यातली वडगाव मावळात वनाधिकारी असताना शिरवते धरणावर पक्षिनिरीक्षणासाठी जाई.त्या वेळी नुकतीच कुठं नोकरीला सुरवात झाली होती.तिथं असताना त्यांचा पहिला परिचय झाला.तिथपासून त्यांच्या आठवणी मनात गर्दी करू लागतात.


डॉ.सालिम अलींच्या आठवणी म्हणजे पक्ष्यांच्या आठवणी! त्यांची पत्नी तेहमिना यांचं निधन अगदी तरुण वयात झाल्यानंतर त्यांना व्यक्तिगत असं आयुष्य राहिलं नव्हतं.अवघा संसार पक्ष्यांचा झाला.सारं विश्व त्यांचं घर झालं.


लोणावळ्याजवळ वलवण गावातून जाताना वलवण धरणाची उंचच उंच दगडाची भिंत दिसते.तिथून आतल्या जंगलात गेलं की,शिरवते जलाशयाचं विपुल नितळ पाणी दिसतं.धरणाच्या दोन्ही बाजूंना हिरवी वनश्री.इथं मी पक्षिनिरीक्षणाला जायचो.

पाणकावळे पाण्यात मासे पकडताना दिसायचे.वृक्षांच्या जून खुंटांवर करोते पंख पसरून बसलेले असायचे.जिथं ओढ्याचं पाणी धरणात मिळतं तिथल्या कातळावर उभा राहून एखादा कातोडी उंच उड्या घेणाऱ्या चंदेरी मासळीचा तलवारीनं छेद करताना दिसे.मी डॉ.सालिम अलींना पत्र लिहिलं.त्या वेळी त्यांचा प्रत्यक्ष परिचय नव्हता.'एकदा वडगावला या.शिरवते जलाशयावर जाऊ.तिथं खूप पाणपाखरं दिसतात. पक्षिअभयारण्य करण्याच्या दृष्टीनं सल्ला पाहिजे.'


ते अनेक कामांच्या व्यापात गढलेले.लवकर येणं झालं नाही.बदली झाल्यामुळं मी वडगाव सोडण्याच्या तयारीत होतो.एके दिवशी गेटमधून एक स्टेशन वॅगन सरळ आत आली. गाडीतून साध्या पोशाखातील व्यक्ती उतरली.ती स्मित करीतच दाराकडे येत होती.चणीनं लहान,शिडशिडीत अंगकाठी,चेहऱ्यावर शुभ्र दाढीमिशा. रंगानं गोरी.राघूसारखं नाक.डोक्यावर सावलीची टोपी. अंगात शुभ्र पँट.बाह्यांचा गंजीफ्रॉक.गळ्यात दुर्बीण.मी ओळखलं.ते,डॉ.सालिम अली होते.ही आमची पहिली भेट.


मी डॉ.सालिम अलींना नम्रपणे वाकून नमस्कार केला. त्यांनी खांद्यावर हात ठेवून थोपटलं.आम्ही घरात खुर्चीवर स्थानापन्न झालो.मी समोर बसून शिरवते जलाशयाविषयी इत्थंभूत माहिती सांगितली.तिथं आढळून येणाऱ्या पक्ष्यांची यादी दाखविली. पक्षिअभयारण्याकरिता तो जलाशय कसा आदर्श आहे, हे नकाशावरून दाखवून दिलं.सरोवराभोवती असणाऱ्या सुंदर चिरपल्लवी जंगलाविषयी सांगितलं.ते क्षेत्र त्यांना माझ्याबरोबर फिरून पाहायची इच्छा होती,पण मला ते आता शक्य नव्हतं.ही घटना १९६३ची.गुरूनं शिष्याच्या शोधात यावं,तसे ते माझ्या जीवनात आले.मनातील पाखरं जागी झाली.आता त्या उडालेल्या पक्ष्यांचा शोध घेत आयुष्यभर भटकतोय.


१९७० सालच्या डिसेंबर महिन्यात डॉ.सालिम अली आणि त्यांना गुरुस्थानी असलेले जर्मनीतील प्रख्यात पक्षिशास्त्रज्ञ डॉ.स्ट्रेसमन महाशय व त्यांचा चार-पाच जणांचा मित्र परिवार कर्नाळ्यात पक्षि-निरीक्षणासाठी आला.त्यांचा चार-पाच दिवसांचा मुक्काम होता.


वडगावच्या भेटीनंतर पुन्हा त्यांची भेट अशी कर्नाळ्यात झाली.

वनकुटीतील त्यांच्या शेजारच्या कक्षात मी थांबलो,तेव्हा त्यांना मला अगदी जवळून पाहता आलं. ते पहाटे चारला उठत.

मुखमार्जन उरकल्यानंतर पाच वाजता पक्षिनिरीक्षणाला जायच्या तयारीत असत.त्या वेळी त्यांचा पोशाख हिरव्या रंगाचा असे.

ऑलिव्ह ग्रीनची पँट,अंगात पोपटी रंगाचा शर्ट,डोक्यावर पी-कॅप, गळ्यात दुर्बीण व हातात नोंद वही आणि पायात निळ्या रंगाचे कॅनव्हास शू.अशा वेळी ते उभ्या उभ्या फळांचा नास्ता करीत.विशेषतः संत्री त्यांना खूप आवडायची.


बरोबर साडेपाचला आम्ही सारेजण पक्षिनिरीक्षणाला कर्नाळा किल्ल्याकडे निघालो.वाटेनं पाखरांची गाणी ऐकत,त्यांच्या आवाजावरून ती' ओळखत,तर कधी त्यांच्या रंगरूपावरून,तर कधी आकार आणि उड्डाणाच्या लकबीवरून स्ट्रेसमन महाशय पक्ष्यांची ओळखण सांगत.एका ठिकाणी झाडाखाली पाखराची पिसं विखुरलेली दिसली.त्यावर त्यांनी सांगितलेली माहिती अतिशय मार्मिक होती.ती पिसं कुठल्या पाखराची,त्या पाखराला कुणी मारलं,कसं मारलं, हे सांगत असता ते वाकून पिसाच्या अवतीभवती फिरून पाहत.नोंदवहीत बारीकसारीक गोष्टींच्या नोंदी करीत. खून झाल्यावर पोलिसानं गुन्हेगाराला शोधून काढावं तसा काहीसा हा प्रकार होता.एका परीनं ते माझं पक्ष्यांविषयीचं अरण्यवाचनच होतं.त्या अरण्यवाचनाची सुरवात झाली ती अशी.


पक्षिनिरीक्षणाला अशी सुरवात झाली.ती उत्तरोत्तर डॉ. सालिम अलींच्या सहवासात वाढत गेली.ते जर परदेशात अथवा हिमालयात गेले नसतील,तर अगदी नियमितपणे दर शनिवारी मुंबईहून पनवेलच्या माझ्या घरी बरोबर पहाटे पाचाला स्टेशन वॅगननं येत.मी त्यांची येण्याची वाटच पाहत बसलेला असे.लगेच आम्ही कर्नाळ्याची वाट धरत असू.सकाळी सहा ते नऊपर्यंत आम्ही जंगलातील साऱ्या पायवाटा तुडवीत पक्षिनिरीक्षण करीत असू.नंतर साडेनवाला विश्रामगृहावर परतल्यावर समोरच्या हिरवळीवर चहा घेत असू.पक्षिनिरीक्षणाची दुसरी फेरी पनवेल-पुणे रस्त्यापलीकडच्या जंगलात करीत असू.पक्षी कुठं पाहावेत,

निरीक्षण करताना त्यांना नेमकं कसं शोधून काढावं,एकदा शोधून काढल्यानंतर त्यांच्याविषयीच्या माहितीच्या नोंदी वहीत कशा कराव्यात,हे पहिल्यांदा त्यांच्याकडूनच मी शिकलो.


आपल्या सुंदर सरळ अक्षरात त्यांना नोंदी करताना मी अनेकदा पाहिलं आहे.परतीच्या वाटेवरून चालताना ते सांगायचे, "पक्षिशास्त्र हे अनेक शास्त्रांचं शास्त्र आहे. पक्षितज्ज्ञांना वनस्पतिशास्त्र,तशीच कीटकशास्त्राची माहिती पाहिजे.त्याला वनं आणि वनाच्या प्रकारांविषयी ज्ञान हवं.भूगोलाचा अभ्यास हवा. रसायन आणि भौतिकशास्त्राचा परिचय पाहिजे.गणिताकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.इतर शास्त्रांप्रमाणं पक्षिशास्त्राला देखील अंत नाही.ते नित्य नूतन आहे."


मी शास्त्र आणि वानिकी शिकलो असल्यानं मला त्यांनी उल्लेख केलेल्या जवळजवळ सर्वच शास्त्रांची माहिती होती.

पक्षिनिरीक्षणामुळं इतर शास्त्रांतही उत्तरोत्तर प्रगती झाली.ते सर्व ज्ञान मनात ताजंतवानं राहिलं.त्यांचा विसर तर कधीच पडला नाही.विहंग अवलोकनाची खरी किमया त्यांनीच मला शिकविली.


ब्रेडस्लाइसपासून बनविलेले शाक किंवा सामिष टोस्ट आणि फळं असा त्यांचा मिताहार असे.थोडी विश्रांती घेतल्यावर ते अलिबागजवळ असलेल्या किहीमला जात.तिथं त्यांचा बंगला होता.रविवारचा संपूर्ण दिवस तिथं घालवून पुन्हा ताजेतवाने होऊन सोमवारी ते परत मुंबईला जात.अशा रीतीनं जवळजवळ चार वर्षे मी त्यांच्या सहवासात असताना पक्षिशास्त्राचे धडे घेतले. कर्नाळ्यात अंदाजे दीडशे प्रकारचे पक्षी आढळून येत.ते मी त्यांच्या आवाजावरून ओळखत असे.


कित्येकदा ते अचानक कर्नाळ्याला येत.मी कुठंतरी जंगलात पक्षिनिरीक्षण करीत भटकत असे.माझी चौकशी करून मला बोलावून घेत असत.माझ्याकडे स्मित करीत ते म्हणायचे,"मला तुमच्या जंगलातील वास्तव्याचा हेवा वाटतो.तुमच्यासारखं अहोरात्र जंगलात राहून पक्षिनिरीक्षण करता आलं असतं,तर मोठी बहार आली असती."अशा वेळी मी त्यांच्याकडे स्मित करीत पाहायचो.ते म्हणायचे,"चितमपल्ली,आपण असं करू या.तुमचं जीवन मला द्या,अन् माझं जीवन तुम्ही घ्या."


मी नम्रतेनं म्हणायचो,"सर,आपली बरोबरी मी काय करणार? पण आपणाला वचन देतो,मला संधी मिळाली,तर एक चांगला वनाधिकारी आणि पक्षिशास्त्रज्ञ होऊन दाखवीन."


ते माझ्या खांद्यावर हात ठेवून म्हणायचे,"मला त्याची खात्री आहे."


'पिंक हेडेड डक' हे रानबदक नामशेष झालं होतं. चकचकीत गुलाबी डोकं आणि मान असलेला हा सुंदर पक्षी साऱ्या रानबदकांत उठून दिसतो.बाकीच्या शरीराचा रंग तपकिरी पिंगट असतो.आभाळात उडू लागला की,पंखाखालील पिवळट गुलाबी रंग त्याच्या शरीराच्या तपकिरी रंगाला शोभून दिसतो.


एकदा नवेगावच्या तळ्यात ह्या पक्ष्याची जोडी पाहण्याचा योग आला.माझा माझ्या डोळ्यांवर विश्वास बसेना.जवळजवळ पन्नास-साठ वर्षे नामशेष झालेला पक्षी दिसल्याचा आनंद गगनात मावेनासा झाला.मी माधवराव पाटलांना आणून तो दाखविला,

तेव्हा त्यांचीही खात्री पटली.त्यांनी देखील पंचवीस ते तीस वर्षांपूर्वी नवेगावजवळच्या वांगी आणि चिंगीच्या तळ्यात तो पाहिल्याचं आठवत असल्याचं सांगितलं.


१९७८ साल असावं.डॉ.सालिम अली 'बार्ड जंगल आऊलेट'च्या शोधात मेळघाटच्या जंगलात फिरत होते. त्या वेळी त्यांना तो सापडला नाही.परंतु १९८२ साली नवेगाव बांध येथील संजय कुटीजवळच्या जंगलात हुमायुन अब्दुलाली ह्या पक्षितज्ज्ञाला तो पहिल्यांदा दिसला.


जेरडॉन कोर्सर ह्या पक्ष्याची कथाही अशीच आहे. अंदाजे शंभर वर्षांपूर्वी हा तितिरासारखा जमिनीवर राहणारा पक्षी जेरडॉन ह्या पक्षिशास्त्रज्ञान चंद्रपूर जिल्ह्यातील सिरोंच्याच्या जंगलात पाहिला होता. अलीकडच्या काळात त्या पक्ष्याचा शोध घेता तो नामशेष झाल्याचं जाहीर करण्यात आलं.डॉ.सालिम अलींनी मला तो शोधून काढण्याची सूचना दिली.मला आत्मविश्वास होता की,तो सिरोंच्याच्या नदीकाठच्या जंगलात निश्चित आढळून येईल.मी त्याचा सप्टेंबर ८४ मध्ये शोध सुरू केला.तेव्हा आढळून आलं की,तो पक्षी तिथं अजूनही आहे.


एक अशीच आणखी आठवण.डॉ.सालिम अली यांच्या सूचनेवरून मी तणमोराच्या शोधला लागलो होतो.


तणमोराला इंग्रजीत 'लेसर फ्लोरिकन' म्हणतात.हा पक्षी माळढोकाच्या कुळातला.खरं म्हणजे त्याला 'छोटा माळढोक' ही म्हणतात.गेली पंचवीस-तीस वर्षं हा पक्षी कुणाच्या फारसा नजरेला आला नाही.पूर्वी तो खानदेशात आढळून येई.यातला नर दिसायला मोरासारखा,तर मादी तितिरासारखी.आकार कोंबडीएवढा.त्याचं आवडतं निवासस्थान गवती कुरण.तणात राहणारा मोर तो तणमोर.तणमोर एखाद्या डोंबाऱ्यासारखा सात ते आठ फूट उंच उड्या मारतो.माद्यांना साद घालतो.त्याचं ते कौतुक पाहायला पाच-सहा माद्या त्याच्याभोवती जमा होतात.जुन्या काळात पावसाळ्यात कुरणातल्या एखाद्या उंच ठिकाणी सकाळी उभं राहिलं की,हे अद्भुत दृश्य दिसत असे.


पण असलं दृश्य गेल्या पाव शतकात पक्षिशास्त्रज्ञांना दिसलेलं नव्हतं.चौकशी चालू झाली.हा दुर्मिळ सुंदर पक्षी नष्ट झाला की काय? अनेक नवोदित पक्षिशास्त्रज्ञ साऱ्या भारतभर त्याचा मागोवा घेऊ लागले.


वयोवृद्ध डॉ.सालिम अली स्वतःत्या पक्ष्याचा शोध घेत फिरताना जुलै महिन्यात इंदूरला गेले.तिथून दहा-बारा किलोमीटर अंतरावर एका वनाधिकाऱ्यानं त्यांना गवती रानात तणमोराची जोडी व सहा पिलं दाखवली.ते दृश्य पाहून डॉक्टर अक्षरशः लहान मुलाप्रमाणे नाचले.ज्या अर्थी मध्यप्रदेशात हा पक्षी दिसला,त्या अर्थी त्याला जोडून असणाऱ्या विदर्भातही तो सापडायला पाहिजे,असं त्यांचं अनुमान होतं. महाराष्ट्राच्या मुख्य वनसंरक्षकांना जुलै ८१ मध्ये डॉ. सालिम अलींनी पत्र पाठवलं.लिहिलं होतं, 'वनविभागातील अधिकारी मारुती चितमपल्ली यांना तणमोर पक्ष्याच्या सर्वेक्षणाला पाठवाल काय?'वरिष्ठ अधिकाऱ्यांत याविषयी विचारविनिमय झाला.मला तीन-चार महिन्यांकरिता नवेगावबांधहून सुट्टी मिळाली.पावसाळ्याचे तीन-चार महिने विदर्भातल्या आठ जिल्ह्यांतून तणमोराचा शोध घ्यायचा होता.


सर्व पाहणीनंतर माझी खात्री झाली की,तणमोर सर्व विदर्भात आहेत.मात्र शिकार आणि पिकांची औषधफवारणी इत्यादींमुळं त्यांची संख्या कमी होत चालली असावी,पण हा पक्षी नष्ट झालेला नाही.मुंबईस जाऊन डॉ.सालिम अलींची मी भेट घेतली.दौऱ्याचा धावता वृत्तान्त श्रवण करून त्यांनी पाठीवर हात ठेवून शाबासकी दिली.सविस्तर अहवाल खात्यातर्फे पाठवायला सांगितला.


मुंबईतील पाली हिलमधील त्यांच्या घरी मी अनेकदा गेलोय.

अनेक मजली उंच इमारतींच्या समूहात त्यांचं ते कौलारू घर एखाद्या पाखराच्या घरट्यासारखं शोभे.समोर बैठक कक्ष.

त्यातून आत गेलं की,लांबच लांब हॉल.हॉलच्या मध्यावर तितक्याच लांबीच्या टेबलांची ओळ.टेबलांवर ठिकठिकाणी पुस्तकांचे ढीग ठेवलेले.त्या ग्रंथांच्या ढिगाआड ते कुठंतरी बसून लिहीत-वाचीत असलेले.त्यांचा ग्रंथसंग्रह प्रचंड होता. त्यात इंग्रजीबरोबर इतर परदेशी भाषांतील पुस्तकांचाही समावेश होता.साऱ्या भिंती पुस्तकांच्या.मी त्या ग्रंथसंपत्तीकडे वेड्यासारखा पाहत राही.तो डॉ.सालिम अली समोरून स्मित करीत आनंदानं स्वागत करीत येत. अशा वेळी हाफ पँट आणि अंगात जर्सी अशा साध्या पोशाखात ते असत.त्यांची राहणी अत्यंत साधी होती. स्वभाव मनमोकळा,शिस्तप्रिय,वक्तशीर आणि भिंतीवर त्यांच्या पत्नीच्या फोटोशिवाय अन्य कुठलीही चित्रं नाहीत.


भारतात नामशेष झालेले वरील तीन प्रकारचे पक्षी म्हणजे पिंक हेडेड् डक, बार्ड जंगल आऊलेट, जेरडॉन कोर्सर हे विदर्भातून शोधून काढण्यात आम्हाला यश मिळालं, ह्यापरता आनंद नाही. त्यांना मी दिलेलं वचन अशा रीतीनं पुरं करून दाखविलं.


डॉ.सालिम अली यांच्या निधनाच्या बातमीनं मला धक्काच बसला.

यापूर्वी त्यांच्या आयुष्यात दोनदा त्यांच्या निधनाची वार्ता जगभर पसरली होती.


अशा बातमीनं त्या व्यक्तीला दीर्घायुष्य लाभतं म्हणतात. त्यांच्या बाबतीत ते खोटं ठरलं.शतायुष्याकडे झुकलेल्या डॉ.सालिम अलींची ह्या वेळची त्यांच्या मृत्यूची वार्ता खरी ठरली.त्यांच्या मृत्यूनं पक्षिशास्त्राच्या एका सुवर्णयुगाचा अंत झाला आहे.


डॉ.सालिम अली हे परमेश्वररूपी सुंदर पक्ष्याच्या गूढरम्य रूपाचा शोध आयुष्यभर घेत होते.कैलास आणि मानस सरोवराची म्हणजे पक्षितीर्थाची यात्रा करणारा हा युगपुरुष ह्या धरतीचा नव्हताच.त्यांचं नातं पक्ष्यांप्रमाणं आभाळाशी होतं.म्हणूनच आता ते परमहंस गतीला मिळाले आहेत.

२/५/२५

प्रारंभी / initially

" छोटा असो किंवा मोठा पण आपला प्रवास अगदी स्वतःपासून सुरू व्हावा."


सर्वांना धन्यवाद व नमस्कार,या लेखापासून एक नवीन लेखनमाला आपण सुरु करीत आहोत.सॉक्रेटिस यांनी म्हटल्याप्रमाणे,तुमचा मौल्यवान वेळ पुस्तके वाचण्यात घालवा,यामुळे या पुस्तकांच्या लेखकांना मोठ्या कष्टाने जाणून घेता आलेली प्रत्येक गोष्ट जाणून घेणे तुम्हाला सोपे होईल.


सर्वोत्तम देणगी,जिम स्टोव्हॅल,स्वाधारित कलासामग्री,डॉन बिलिंग्ज,अनुवाद - दिशा केळकर EMBASSY BOOK DISTRIBUTORS


माझं वय 80 वर्षे असताना आणि वकिली सुरू करून 52 वर्षे झालेली असताना माझं आयुष्य कायमस्वरूपी बदलून टाकणाऱ्या एका दिव्यातून मला जावं लागलं.


बोस्टनमधल्या मध्यवर्ती भागात माझे ऑफिस आहे. वरच्या मजल्यावरच्या एका कोपऱ्यातल्या खोलीत एका मोठ्या महॉगनी लाकडाच्या टेबलाशी मी बसलो होतो. संगमरवरी प्रवेशदालनाच्या दारावरच्या पितळी जुनाट पाटीवर हॅमिल्टन,हॅमिल्टन आणि हॅमिल्टन असं नाव दिसतं.मी त्यातला पहिला हॅमिल्टन म्हणजेच थिओडर जे.हॅमिल्टन.उरलेले दोघे म्हणजे माझा मुलगा आणि माझा नातू.


अवघ्या बोस्टनमध्ये आमची फर्म सर्वात प्रतिष्ठित फर्म आहे असं नाही,असं मी म्हटलं तर तो माझा सावधपणे बोलण्याचा गुण असं म्हणेल कोणी,पण दुसरं कोणी असं काही म्हटलं तर मी अगदी सहमत होईन त्याच्याशी.


एकदा असाच मी माझ्या प्रशस्त आणि जरा जुनाट झालेल्या ऑफिसमध्ये बसलो होतो.मनात विचार घोळत होता,आपण कुठवर येऊन पोचलो ? सुरुवात विधि-महाविद्यालयातल्या त्या धडपडीच्या दिवसांची होती.भिंतीवर माझे फोटो होते.ते पहातांना मला गंमतच वाटली.पाच तर अमेरिकेच्या गेल्या पाच अध्यक्षांबरोबरचे आणि इतर अशाच महत्वाच्या व्यक्तींबरोबर घेतलेले.


मग नजर गेली पुस्तकांच्या शेल्फांकडे.जमिनीपासून छतापर्यंत उंचीची ती कपाटे चामड्याच्या बांधणीतल्या पुस्तकांनी गच्च भरली होती.ते खानदानी चामड्याचं फर्निचर काय, शपूर्वेकडून आणलेला तो भला थोरला गालिचा काय,सारं माझ्यापेक्षाही आधीचं.हे ओळखी-ओळखीचं वातावरण मनात घोळवत मी आनंदात होतो.तोच टेबलावरचा फोन खणाणला. 


परिचित आणि विश्वासाचा मागरिट हेस्टिंग्जचा आवाज मी ओळखला. ती म्हणाली,"सर,जरा आत येऊन थोडं बोलू का तुमच्याशी ? "


आम्ही चाळीस वर्षांपेक्षा जरा जास्तच एकमेकांबरोबर काम केलं होतं.जेव्हा एखादी गंभीर बाब सांगायची असते तेव्हा तिचा हा उदासवाणा आवाज ती वापरते. "प्लीज आत ये." मी लगेच उत्तरलो.


मागरिट लगेच आत आली,दरवाजा लोटून माझ्या समोर येऊन बसली.तिच्या हातात कॅलेंडर,पत्रव्यवहार किंवा कागदपत्रे काहीच नव्हते.केव्हा बरं यापूर्वी ही अशी काही न येता माझ्या केबिनमध्ये आली होती असं मी आठवत होतो.तेवढयात काही प्रास्ताविक न करता ती एकदम म्हणाली, " मिस्टर हॅमिल्टन,थोड्यात वेळापूर्वी रेड स्टीव्हन्स मेला."


वयाची ऐंशी वर्षे ओलांडली की सवय होते मनाला कुटुंबातल्या किंवा मित्रांपैकी कोणाचा मृत्यू ऐकण्याची. पण काहींचे मृत्यू सहन करणं कठीण जातं.या मृत्यूने मी हादरलोच,साऱ्या भावना,सगळ्या आठवणी यांचा कल्लोळ होत असतानाच मला माझं कर्तव्य करायला हवं आहे याची जाणीव मला झाली.रेडची माझ्याकडून हीच तर अपेक्षा होती.


मी लगेच माझ्या वकिलाच्या भूमिकेत जाऊन मागरिटला म्हणालो,"आपल्याला त्याच्या सर्व कुटुंबियांना बोलवायला लागेल.निरनिराळ्या कार्पोरेट बोर्डाचे लोक,धंद्यातले लोक यांना सांगायला हवं.आणि हे बघ,त्या विविध वार्ताहरांना कसं काबूत ठेवायचं याची तयारी कर.ते आता केव्हाही टपकतील."


मिस हेस्टिंग्ज उभी राहून दाराकडे वळली. बाहेर जाण्याआधी वळून म्हणाली,"मी सांभाळते सर्व काही."


अस्वस्थता आली होती,व्यक्तिगत भावना आणि व्यावसायिक कठोर कर्तव्य यातील सीमारेषेचे भान ठेवत ती म्हणाली, "मिस्टर हॅमिल्टन,तुमच्या हानीबद्दल मला वाईट वाटतंय."


तिनं दरवाजा बंद केला.आणि मी एकटाच माझ्या विचारात गुरफटून गेलो.


दोन आठवड्यांनंतर रेड स्टीव्हन्सच्या निरनिराळ्या नातेवाईकां -

सोबत मी एका मोठ्या कॉन्फरन्स टेबलासमोर बसलो होतो.


मंडळी अटकळी बांधत होती. आणि ही लोभानं गुंतलेली

अटकळबाजीच जणू त्या खोलीत प्रत्यक्ष व्यापून राहिली होती. पुष्कळशा नातेवाईकांबद्दलच्या रेडच्या भावनांची मला कल्पना होतीच.त्याला हवं होतं तसं मी केलं.हा हळहळीचा काळ शक्य तेवढा लांबवला. 


मंडळींना चहा,कॉफी,सरबत किंवा आणखी काही हवं असेल तर द्यायला मागरिटला सांगितलं.समोरची प्रचंड कागदपत्रे मी पुन्हा पुन्हा चाळली.आणि अनेकदा माझा घसा साफ केला.आता जास्त ताणणे बरं दिसलं नसतं म्हणून उभा राहून मोट बांधलेल्या त्या गर्दीला उद्देशून बोललो.


"सभ्य स्त्रीपुरूष हो,तुम्हाला माहीत आहेच की हावर्ड रेड स्टीव्हन्स याचं मृत्युपत्र आणि इतर महत्त्वाचे कागद यांचं वाचन करायला आपण येथे जमलो आहोत.मला समजतंय की आपल्याला हे जड जातंय.आणि या कायदेशीर आर्थिक बाबींच्या काळजीपेक्षा तुमचं वैयक्तिक दुःख कितीतरी जास्त आहे."


मला माहीत होतं की जिथे कुठे रेड असेल तिथे त्याची या खोचक बोलण्यानं करमणूकच झाली असणार.


"या कायदेबाज प्रास्ताविक मजकुराला मी फाटा देतो आणि थेट मुद्याकडे वळतो.रेड स्टीव्हन्स सर्वच दृष्टींनी एक यशस्वी माणूस होता.त्याच्या सारखंच त्याचं हे मृत्युपत्रातलं मिळकतदानपत्र आहे.अगदी साधं, सरळ आणि स्पष्ट."


"मिस्टर स्टीव्हन्सने मागच्या वर्षीच पंचाहत्तरावा वाढदिवस साजरा केला आणि तेव्हाच मी त्याचे सुधारित मृत्युपत्र तयार केले.

आमच्या दोघांतील वारंवार होणाऱ्या बोलण्यानंतर त्याची अंतिम इच्छा या कागदोपत्री अवतरली.मी आता ते प्रत्यक्षच वाचतो. आणि तुम्हा सर्वांच्या लक्षात येईल की या कायदेशीर आणि बंधनकारक बाबींमधले काही उतारे प्रत्यक्ष रेडच्या शब्दांमध्ये येतात." "पॅनहँडल ऑइल अ‍ॅण्ड गॅस ही माझी पहिली कंपनी मी माझा सर्वात मोठा मुलगा जॅक स्टीव्हन्स याला देत आहे.हे मृत्युपत्र लिहीत असताना पॅनहॅडल कंपनीचं मोल 600 दशलक्ष डॉलरच्या आसपास आहे."


टेबलाच्या भोवताली कित्येकांचा आ वासला.तर त्याच वेळी एका दिशेने लांबलेला हर्षोद्गार ऐकू आला.मी टेबलाच्या कडेवर हातातली कागदपत्रं ठेवली आणि माझ्या वाचायच्या चष्म्याच्यावरून भुवया उंचावून बघितले.ती माझी नेहमीची कोर्टरूममधील लकब होती.


थोडं थांबून मी परत कागदपत्र उचलून वाचू लागलो.


"जरी कंपनीचा मालक पूर्णतःजॅक असला तरी सर्व कारभार आणि व्यवस्थापन पॅनहँडल कंपनीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सच्या सभासदांच्या हाती असेल.या लोकांनी गेली बरीच वर्षे उत्तम काम बजावलंय.मी जिवंत असताना,जॅक तू कंपनीच्या कामात काहीच रुची दाखवली नाहीस.मी मेल्यावर आता तुला ती नसणारच असे मी मानतो.तुझ्यासारख्या माणसाच्या हातात पॅनहँडल सारखी कंपनी सोपविणे म्हणजे तीन वर्षाच्या बालकाच्या हातात भरलेली बंदूक देण्यासारखे होईल.तुला जाणवून देतो की मी मिस्टर हॅमिल्टनला सूचना दिल्या आहेत की जेणेकरून तू जर कंपनीवर ताबा मिळावा म्हणून लढलास किंवा बोर्डाच्या कामात ढवळाढवळ केलीस,एवढंच काय पण जरी नुसती माझ्या मृत्युपत्रान्वये मिळालेल्या देणगीबाबत तक्रार केलीस तरी पॅनहँडल ऑइल अ‍ॅण्ड गॅस कंपनी तत्काळ धर्मादायला दिली जाईल."


कागदांवरची नजर मी जॅक स्टीव्हन्सकडे वळवली. शक्य तेवढ्या सर्व भावनांचा कल्लोळ त्याच्या चेहऱ्यावर दिसत होता.सत्तावन्न वर्षांच्या त्या खुशालचेंडू माणसाला कधी स्वतःची रोजीरोटी कमावण्यातलं सुख कळलंच नव्हतं. त्याच्या हाती पॅनहँडल ऑईल अ‍ॅण्ड गॅस कंपनीची सूत्रं न ठेवण्याने त्याच्या बापाने त्याच्यावर काय उपकार केले आहेत याची त्याला कल्पनाच नव्हती.आणखी एकदा आपण आपल्या प्रसिद्ध बापाच्या नजरेत नापास झालो एवढंच त्याला वाटलं हे मला ठाऊक होते.


मला जरा जॅकची दयाच आली.मी त्याला म्हणालो, 


"मिस्टर स्टीव्हन्सने मृत्युपत्रात असं सांगितलंय की क्रमाक्रमाने मृत्युपत्र वाचतांना संबंधित माणसांचा भाग वाचून झाल्यावर त्यांनी निघून जावे."


गोंधळलेल्या नजरेने माझ्याकडे बघून तो उद्‌गारला, "काय?"


तत्परतेने मिस मागरिटने त्याचा हात धरला आणि म्हणाली,"मिस्टर स्टीव्हन्स,मी तुम्हाला दारापर्यन्त सोडते." सर्वजण आपापल्या जागी बसल्यावर अटकळी बांधणे पुन्हा तापू लागले.मी चालू केले."माझी एकुलती कन्या रूथ हिला राहते घर,ऑस्टिन-टेक्ससमधले रँच आणि त्यातली गुरेढोरे यांचा व्यवहार यांची मालकी मिळेल." रूथ टेबलाच्या टोकाशी,तिचा संभ्रमावस्थेतला नवरा आणि अपत्य यांच्यासह बसली होती.एवढ्या अंतरावरूनही हावरटासारखं टाळी वाजवून वाजवून खुषीत हातावर हात चोळणं ऐकू येत होते.ती मंडळी स्वतःतच इतकी दंग होती की एकूण कारभारापासून त्यांना दूर ठेवलंय आणि ते स्वतःचे किंवा दुसऱ्या कोणाचे भलं बुरं काही करू शकणार नाहीत हे त्यांना कळलं की नाही कोण जाणे.मिस् हेस्टिंग्जने त्यांना तत्काळ दारापर्यंत पोचवले.


मी घसा साफ करून वाचन चालू केले."राहता राहिला माझा सर्वात धाकटा मुलगा बिल.त्याला मी माझे सर्व शेअर्स,बॉण्ड्स आणि निरनिराळ्या ठिकाणची गुंतवणूक यांचे उत्पन्न देतो.पण याची सर्व देखभाल मिस्टर हॅमिल्टन आणि त्यांची फर्म यांच्याकडे राहील.

असं करून तुझं मृत्युपत्र कोणी जेव्हा वाचेल तेव्हा काही वाटणी करायला शिल्लक असेल."


दूरच्या नातेवाईकांना काही ना काही मिळाले. उत्सुकतेने ते इतका वेळ ताटकळत बसले होते.खोली बरीचशी रिकामी झाली मी आणि मिस मागरिट सोडून आता फक्त एक जणच उरला.


चोवीस वर्षाच्या जेसन स्टीव्हन्सला मी टेबलाशी बसलो असतानाच पाहिले.माझ्या आयुष्यभराच्या जिगरी दोस्ताचा तो पुतणनातू होता.राग,अनादर आणि अवज्ञा यांनी ओतप्रोत भरलेल्या नजरेने मो माझ्याकडे टक लावून बघत होता.

आयुष्यभर स्वयंकेन्द्रीपणा आंगवळणी पडलेल्यालाच तसं बघणं जमणार होतं.


टेबलावर त्याने हात आपटला आणि गुरकावत मला म्हणाला,"त्या खवचट थेरड्याने मला काहीच ठेवलं नसणार.माझी नेहमी निर्भर्त्सनाच करायचा तो." उभा राहून तो जायला निघाला सुद्धा.


"अरे,अशी घाई नको करू.तुझं नाव आहे या मृत्युपत्रात." मी म्हणालो.


पुन्हो तो खुर्चीत येऊन बसला.वाटलेली आशा लपवण्याचा प्रयत्न करीत मख्ख चेहऱ्याने माझ्याकडे टक लावून बघू लागला.


मी पण तशाच मख्खपणे त्याच्याकडे पाहिले.मी ठरवलं होतं की हा बोलेपर्यंत आपण बोलायचं नाही.ऐशी वर्षांचं वय झाल्यावर धीर धरणे सोपे जाते.


असह्य झाल्यावर तो म्हणाला, "ठीक आहे.काय दिलं आहे मला त्या बुढ्याने ?"


मी खाली बसून कागद चाळू लागलो.जेसन स्टीव्हन्स पुटपुटला, " काहीही नसणार."


मी माझ्या खुर्चीतून त्याच्याकडे स्मित करून म्हटले, "अरे गड्या,म्हटलं तर सगळं काही आणि म्हटलं तर काहीच नाही असं एकाच वेळी आहे बघ."


शिल्लक राहीलेले भाग क्रमशःप्रसारित होतील..।