* विजय गायकवाड | Vijay Gaikawad: अंजन  / Anjan

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

६/५/२५

अंजन  / Anjan

सकाळचं साडेसात वाजून गेलं तरी देविकाचं आटोपलं नाही.७.५० ची लोकल पकडली तरच ऑफिसला वेळेत पोहोचणार,नाही तर लेट मार्क, पगारात कपात ठरलेलीच.

वरून सगळ्यांच्या समोर साहेबांची बोलणी खावी लागणार ते वेगळंच. शिवाय नंतरच्या गाड्यांना गर्दी फार अन् त्या गाडीत ओळखीचंपण कोणी नसतं.


दीड तासांचा कंटाळवाणा प्रवास.नेहमीच्या गाडीनं गेलं की कसं, आधीच्या स्टेशनवरून येणाऱ्या मैत्रिणी जागा पकडतात.निवांत बसून गप्पा मारत जाता येतं.आज उठायला जरा उशीर झाला,तर सगळी कामं मागं आली.घड्याळाचा

काटा काही थांबायला तयार नव्हता.पोरांची आवराआवरही सुरूच होती.


घाईतच देविकानं नवऱ्याला सांगितलं,"रमेश, उठायला उशीर झाल्यामुळं मी आज काही बनवलेलं नाही.जाता जाता पोरांच्या टिफीनमध्ये बेकरीतलं काहीतरी खाऊ घेऊन दे.तूपण ऑफिसमध्ये पार्सल मागव."


"ते ठीक आहे; पण आई-बाबांचं काय?" रमेशनं प्रश्न केला.


"आई बनवतील ना त्यांच्यासाठी काहीतरी ? देविका सहजच बोलून गेली.


"आणि तुझ्या टिफीनचं काय?"


"अरे,आज आमच्या ऑफिसमध्ये एकाचा वाढदिवस आहे.तो मागवणार आहे काहीतरी."


"अगं, तू आज उशिरा उठणार होतीस तर मला नाही का सांगायचंस.नाष्टा बनविला तेव्हाच स्वयंपाकपण करून गेले असते मंदिरात." रमेशची आई म्हणाली.


"जायच्या अगोदर दिसलं नव्हतं का मी उठले नाही ते.काय जायचं असतं रोज मंदिरात ?एखाद्या दिवशी नाही गेलं किंवा थोडं उशिरा गेलं तर देव घेणार नाही का आत?" खांद्यावर ओढणी टाकत बाहेर पडताना देविकानं तावातावानंच उत्तर दिलं.


"अगं पण..." सासू काहीतरी बोलणार तितक्यात देविकानं खाडकन् दरवाजा ओढून घेतला आणि बाहेर पडली.


आईनं रमेशच्या तोंडाकडं बघितलं,तर तो नाष्टा करत करत बोलला,"तुला माहिती आहे ना आई, दिवसभर ऑफिसमध्ये किती काम असतं बिचारीला.एवढ्या मोठ्या खासगी विमा कंपनीत मॅनेजर म्हणून काम करताना किती त्रास होतो ते तुला नाही कळणार.झोपली एखाद्या दिवशी उशिरापर्यंत ती तर नाष्टा बनवलास तेव्हा बनवूनच जायचंस ना जेवण ?"


नाष्टा संपवून रमेश मुलांच्या खोलीत गेला.रिकामे दोन टिफीन त्यांच्या बॅगेत ठेवले.कपडे बदलून बाहेर आला तरी मुलं अजून बुटांची लेस बांधत होती म्हणून त्यांच्यावर खेकसला,"चला ना पटकन् उशीर होतोय मला.आज बेकरीतपण थांबायला लागणार आहे."


तोपर्यंत हातात काहीतरी घेऊन आलेल्या आईनं विचारलं,"संध्याकाळी तू किती वाजेपर्यंत येशील?"


"महिनाअखेरची कामं सुरू आहेत.उशीर होईल यायला.काही काम आहे का?"


"काही नाही रे,तुझ्या बाबांचा हा चष्मा तुटलाय. तेवढा दुरुस्त करून आणशील का येताना?" हात पुढे करीत आईनं विचारलं.


"आई,आताच सांगितलं ना महिनाअखेर आहे म्हणून? आता थोडी कडकी आहे.बघू पुढच्या महिन्यात..." वैतागलेल्या रमेशनं सांगितलं.


"अरे पण चष्मा नाही वापरला तर त्यांना खूप कमी दिसतं,ठेच लागून कुठंतरी पडतील आणि नंबर बदलेल म्हणून म्हटलं."


"आठ दिवसांत नंबरात असा किती बदल होणार आहे,आणू पुढच्या आठवड्यात.नाहीतरी पेपर वाचण्यापलीकडं काय काम आहे त्यांना ? चार दिवस नाही वाचला तर कुठं बिघडतं?"


सोफ्यावर बसून वर्तमानपत्रात तोंड खुपसून चाचपटत बसलेल्या वडिलांकडे बघत रमेश बोलून गेला.


"अरे पण..." आई पुढं बोलणार इतक्यात बाबांनी तिच्याकडं बघितलं आणि डोळ्यांनी खुणावत शांत बसायला सांगितलं.त्या खुणेन आईनं तोंडातले शब्द गिळले आणि रमेश मुलांना घेऊन निघून गेला.


प्रसंग दुसरा


आज रविवार असल्यानं रमेश अजून अंथरुणावर लोळत पडला होता.पोरंही उठायचं नाव घेत नव्हती.


देविका नुकतीच उठून तोंडात ब्रश धरून गॅलरीत उभा होती.आईनं हाक मारली,"रमेश, उठ की रे आता.घड्याळात बघ साडेनऊ वाजून गेलेत..."


आईच्या आवाजानं रमेश उठला आणि डोळं चोळत बाहेर आला."काय हे आई,आज सुट्टी आहे ना? आजतरी निवांत झोपू द्यायचं."


"अरे बाबा,आज कामाला सुट्टी आहे.पोटाला सुट्टी आहे का ? गरमागरम नाष्टा कर आणि मग झोप."


"काय बनवलंय आज?"


"थालीपीठ केलंय,आवडतं ना तुला!"


"रमेश,आज मला पिझ्झा खायचा आहे.जरा फोन करून ऑर्डर कर ना." ब्रश केल्यानंतर तोंड पुसत आलेल्या देविकानं लाडात सांगितलं.


तोवर आतून मुलंपण ओरडली, "अरे वा,पिझ्झा... मला पण.. मला पण.."


"ठिक आहे मागवतो;पण तुम्ही पटकन् आवरा." असं म्हणत रमेशनं फोन उचलला.मुलं उड्या मारत आत गेली.देविकानं पांघरुणाच्या घड्या घातल्या आणि चहाचा कप घेऊन गॅलरीत पेपर वाचत बसली.


थोड्या वेळानं बेल वाजली म्हणून बाथरूममधून बाहेर आलेल्या रमेशनं आवाज दिला,"देविका, उघड गं दार,बघ पिझ्झा आला असेल..."


गडबडीत जाऊन देविकानं दार उघडलं.समोर बघते तर काय,सारा भ्रमनिरास झाला. दारात जोंधळेकर काकू आणि त्यांचा नातू चिंतामणीला बघताच देविकाच्या चेहऱ्यावरील आनंदी छटा उतरली. जुन्या मैत्रिणीला भेटायला आलेल्या काकूंना तोंडात मारल्यासारखं झालं म्हणून काकूनी विचारलं,"दुसरं कोणी अपेक्षित हो काय ?"


"नाही नाही.असं काही नाही.या ना या..." देविकानं लगेच चेहऱ्यावरच भाव बदलला.


"वहिनी आहेत ना घरी?"


"आहेत की. या ना आत..." असं म्हणत देविका मागं सरकली.जोंधळेकर काकूंना दारात उभा बघताच आईनं आतून हाक मारली, "ये गं,अशी बाहेर का उभी आहेस ?"


काकू आत आल्या.त्यांच्या नातवानं बाबांना नमस्कार करताच त्याला शेजारी बसवत बाबांनी विचारलं, "काय, कसा आहेस?"


"मजेत..."


"स्वारी आज अचानक इकडे कशी? रस्ता कसा काय चुकली ?"


"काही नाही हो.बाजारात चालले होते.नेहमी बसनं जाते त्यामुळं मधे थांबणं होत नाही.इतक्या नवीन बिल्डिंगा झाल्यात की मला कळंतच नाही कुठं थांबायचं ते.आज हा गाडी घेऊन बरोबर आला. म्हटलं जाता जाता तुम्हाला भेटून जाऊ.बरेच दिवस झालं गाठभेट नाही."


"दिवस कसले महिने म्हणा.बरं झालं आलात.पूर्वी एका चाळीत रहात होतो,तेव्हा रोज दिसणारी माणसं बघायला आता डोळं उतावीळ असतात. येणं-जाणं असल्याशिवाय हालहवाला कळणार कसा? भेटल्यावर तेवढंच समाधान मिळतं.जुन्या आठवणी ताज्या होतात."


"होय ना..." जोंधळेकर काकू म्हणाल्या.


"रमेश,हा बघ चाळीतला आपल्या शेजारचा चिन्या. किती मोठा झालाय.ओळखलंस का?" आईनं विचारलं.


"हो हो, ओळखलं की..."


"नेहमी तुझ्यासोबतच असायचा.रात्री झोपताना त्याची आई त्याला ओढून घेऊन जायची."


वाघीण,प्रतिक पाटील,स्वच्छंद प्रकाशन ,कोल्हापूर


रमेशच्या डोळ्यांसमोर जुन्या आठवणी तरळू लागल्या.

"काकूंच्या हातच्या स्वयंपाकाला चवच तशी आहे.एक एक पदार्थ आठवला की आजही तोंडाला पाणी सुटतं." असं म्हणत चिंतामणी हसला.


शिल्लक राहिलेला भाग पुढील लेखामध्ये..।