* विजय गायकवाड | Vijay Gaikawad

live

नमस्कार आपले स्वागत आहे. मी पुस्तके आणि मित्रांवर पैसे खर्च करतो,माझ्याकडे दगड आणि विटांवर खर्च करण्यासाठी पैसे नाहीत.- रस्किन बाँड.ही थोर माणसं व त्यांचे विचार मला पुस्तकात भेटलीत.ती भेटली आणि त्यांनी सांगितले कि, प्रत्येक दिवशी असं काही तरी करा की,ते तुम्हाला अधिक सुंदर उद्याच्या दिशेने खूप लांबवर घेऊन जाईल."- डोग फायरबाऊ.' सर्वियन कादंबरीकार मिलोराद पावीच यांचे एक वाक्य आहे ते म्हणतात - जोवर जगात पुस्तक वाचणाऱ्या वाचकांची संख्या बंदूकधारी सैनिका पेक्षा अधिक आहे तोवर काळजीच काहीच कारण नाही.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात.पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये.म्हणून अविरतपणे प्रयत्न करणारे मार्गदर्शक, मित्र धावून येतात.प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,डॉ.दीपक शेटे,आ.भरत बुटाले,प्रा.सर्जेराव राऊत,सुभाष ढगे,अनिल फारणे,डॉ.सुधीर सरवदे ,विश्वास खाडे, विनायक पाटील,संजय कुंभार,सतीश खाडे,मनोहर सुर्वे,गणेश खंदारे,तात्या गाडेकर, दादासाहेब गाडेकर, दादासाहेब ताजणे, पुस्तकातील घटना प्रसंग सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील यांनी केलेले आहे. मला लिहिण्याची प्रेरणा देणारी पुस्तके,लेखक,प्रकाशक,मित्र ही जगावेगळी माणसं माझ्या जीवनातील महत्वाचा टप्पा आहेत.... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ.मेघा गायकवाड, चिरंजीव मयान,माझ्या धावण्यातील गुरुवर्य नामदेव बरुरे,लुल्ला शेख मोठी ताई ,लहान ताई जयश्री शिंदे या सर्वांचेच मनापासून आभार व धन्यवाद मॅट्रिक फेल विजय गायकवाड

९/१२/२५

यूरोप व आशिया यांमधील दवा : मार्को पोलो / Medicine in Europe and Asia:Marco Polo

डान्टेचा मृत्यू आपणास चौदाव्या शतकाच्या दुसऱ्या दशकात आणून सोडतो.तेराशे वर्षे चाललेले युरोपातील राष्ट्रांचे सुसंस्कृत होण्याचे दुबळे प्रयत्न आपण पाहत आलो.ते प्रयत्न पाहून कीव येते.शहरे उभारीत आहेत व धुळीस मिळवीत आहेत;चित्रे रंगवीत आहेत,तलवारी परजीत आहेत,संगमरवरी पुतळे खोदीत -आहेत; माणसांच्या कत्तली करीत आहेत;मंदिरे बांधीत आहेत, काव्ये व गीते रचीत आहेत;आपल्या बांधवांना ठार मारीत आहेत,असे प्रकार आपणास या शतकात दिसतात.गॅलिलीच्या ज्यू ख्रिस्ताचा तो शांत व सुंदर धर्म त्यांनीपण मानवांचा छळ करण्याचे साधन म्हणून तो वापरला.मानवप्राणी पशुकोटीतून मानवकोटीत यायला एक कोटी वर्षे लागली.पण चौदाव्या शतकाच्या आरंभास हा मानव कसा दिसतो ? अद्यापि त्याच्यामध्ये नव्वद टक्के पशुता,तर केवळ दहाच टक्के मानवता दिसून येते.आपण थोडा वेळ ग्रोपातील श्वेतवर्णीयांना सोडून जरा दूर आशियातील पीतवर्णीयांकडे जाऊ या व खिस्ताच्या आगमनापासून तो डान्टेच्या निधनापर्यंतच्या चौदा शतकांचा या पीतवर्णीयांनी कसा उपयोग केला ते पाहू.!


तिकडे युरोप सरंजामशाहीच्या रानटीपणात बुडत असता,

अधःपतित होत असता,इकडे चीन सुधारणेच्या व संस्कृतीच्या शिखरावर चढत होते.युरोपला रानटी टोळ्यांच्या स्वाऱ्यांपासून त्रास झाला,तसा चीनलाही झाला. पण युरोपप्रमाणे चीन कोलमडले नाही. चीनमध्ये सरंजामशाही जवळजवळ नव्हतीच. युरोपातील श्वेतवर्णीय लोकांत जसे परस्पर लढणारे शेकडो पंथ व भेद निर्माण झाले,तसे चीनमध्ये झाले नाही.युरोपातील संपत्ती,संस्कृती ज्ञान व सौंदर्य मध्ययुगातील युद्धांनी धुळीत जात असता इकडे चीनमधील संपत्ती,संस्कृती व सौंदर्य ही अविरत झगड्यांमुळे नष्ट झाली नाहीत;जिवंत राहिली. 


ग्रीक संस्कृती व रोमन संस्कृती जवळजवळ हजार वर्षांत जणू नष्ट होऊन गेल्या;पण चिनी संस्कृती मात्र कधीच मेली नाही,एक दिवसही दृष्टिआड झाली नाही. दुसऱ्या शतकापासून चौथ्या शतकापर्यंत चिनी चित्रकारांनी जगातील अत्यंत रमणीय अशी निसर्गाची चित्रे रंगविली आहेत.त्या तीन शतकांतील अपूर्व व अप्रतिम अशी चिनी चित्रे,सुंदर काव्ये व भव्य शिल्पे यांना जगात तुलना नाही.आजही अमर सौंदर्याचे नमुने म्हणून त्यांच्याकडे बोट दाखविता येईल.सहाव्या शतकात चिनी लोकांनी लाकडी ठसे निर्मून छापण्याची कला शोधून काढली.त्या काळात चिनी लोक गॅस व दगडी कोळसे वापरीत असे आढळते;पण युरोपातील लोक मात्र या गोष्टी वापरण्यास कित्येक शतकांनंतर शिकले.सहाव्या शतकातच चिनी लोकांस बंदुकीची दारू माहीत होती.पण शांतताप्रिय चिनी लोकांनी या शोधाचा उपयोग स्वार्थासाठी मात्र कधीही करून घेतला नाही.सातवे शतक म्हणजे चिनी संस्कृतीचे सुवर्णयुग, कला,बुद्धी,नीती,सर्वच बाबतीत कन्फ्यूशियसचे वारसदार साऱ्या जगाच्या कितीतरी पुढे होते.


 इ.स.६२८ मध्ये मुसलमानी धर्मप्रचारक चीनमध्ये आले.त्यानंतर सातच वर्षांनी ख्रिश्चन मिशनरीही आले. त्या वेळेस टाई-त्संग हा चीनचा सम्राट होता.या सम्राटाने आपला कन्फ्यूशियसचा धर्म त्यांच्यापुढे मांडून तीन धर्माचा तिरंगी झगडा माजविण्याऐवजी परधर्मीयांना मोठ्या सन्मानाने दरबारात आणवून न्यू टेस्टामेंट व कुराण यांची चिनी भाषेत भाषांतरे करवून घेतली आणि नंतर त्या धर्मग्रंथात काय आहे,ते स्वतः पाहिले व परीक्षिले,कन्फ्यूशियसने कित्येक शतकांपूर्वी सांगितले होते तेच त्याही धर्मात आहे,असे त्याला आढळले.कन्फ्यूशियसचा धर्म सोडून ख्रिस्त किंवा महंमद यांचा धर्म स्वीकारावा असेही त्याला वाटले नाही,किंवा स्वतःचा धर्म या दोन्ही धर्मांहून श्रेष्ठ आहे हे दाखविण्यासाठी तिकडे ख्रिश्चन व मुसलमान यांना वाटत होती,तशी युद्धे करण्याचीही जरुरी त्याला वाटली नाही.ईश्वराकडे जाण्याचे नाना मार्ग असू शकतील आणि कोणताही मार्ग पत्करला तरी तो देवाकडे नेणारा असेल,तर ठीकच आहे असे टाई-त्सुंग याला वाटले. म्हणून त्याने मुसलमानांना मशिदी बांधण्यास, ख्रिश्चनांना चर्चेस बांधण्यास व दोघांनाही चिनी लोकांत धर्मप्रचार करण्यासही खुशाल परवानगी दिली ! केवळ धर्मवेडेपणाने त्यांनी रक्तपात मात्र करू नये,एवढाच त्याचा कटाक्ष होता.


चिनी संस्कृतीचे विहंगमावलोकन करताना टाईत्संगची सहिष्णुता ख्रिश्चन सम्राट शार्लमन याच्या असहिष्णुतेशी तोलून पाहावी,असे मनात येते.शार्लमन एका दिवसात साडेचार हजार सॅक्सनांना ते ख्रिस्ती होईनात,म्हणून ठार करतो! क्षणभर थांबून या दोन गोष्टींची तुलना करावी असे वाटते,नाही ?


मध्ययुगात चीन संस्कृतीच्या शिखरावर होते.तेराव्या शतकात त्यांची थोडा वेळ जराशी पिछेहाट झाली खरी; पण तीही क्षणभरच.या सुमारास मध्य आशियातील डोंगरपठारावर राहणारे भटके मोंगोलियन चीनवर स्वाऱ्या करू लागले.त्यांचे हूण व तुर्क यांच्याशी थोडेफार संबंध होते.या मेंगोलियनांनी अल्पावधीत पॅसिफिक महासागरातून रशियातील नीपर नदीपर्यंतचा प्रदेश व्यापून टाकला ! चेंगीझखान हा त्यांचा अत्यंत प्रबळ असा पुढारी होता.त्याच्या विद्युन्मय नेतृत्वाखाली थोड्याच अवधीत मेंगोलियनांनी एवढे मोठे साम्राज्य मिळविले की,त्याच्यासमोर अलेक्झांडरचे साम्राज्यही मुलाचे खेळणे वाटावे,पोरखेळ वाटावा.अलेक्झांडरची बेडर निर्भयता,हॅनिबॉलची सहनशीलता,

आशियातील प्राचीन विजेत्यांची अल्लड वृत्ती,तसाच त्यांचा साधेपणा हे सारे गुण चेंगीझच्या ठायी होते.त्याचा आहार म्हणजे घोडीचे मांस असे,त्याचा प्रासाद म्हणजे तंबू असे,त्याचे सिंहासन म्हणजे घोड्याचे जीन असे.राज्य चालविण्यापेक्षा जिंकून घेणे त्याला आवडे;पण इतर जगज्जेत्यांप्रमाणे त्याच्या ठायी सूडबुद्धी नव्हती, रानवटपणा नव्हता.


वेल्स लिहितो, "चेंगीझखानाच्या कारकिर्दीत,त्याच्या साम्राज्यात सर्व आशियाभर संपूर्ण धार्मिक सहिष्णुता होती." पराभूत राष्ट्रांवर आपला रानटीपणा लादण्याऐवजी पराभूतांच्या श्रेष्ठ संस्कृतीतच तो स्वतः रंगला;त्या संस्कृतीनेच त्याला जिंकले,स्वतःमध्ये मिळवून घेतले.त्याने चीन देश भौगोलिकदृष्ट्या जिंकला; पण चीनने त्याला सांस्कृतिकदृष्ट्या जिंकले.एखाद्या महासागरावर मेघांनी वर्षाव करावा तद्वत् मोंगोलियन आले;पण ते चिनी जनतेच्या महासागरात विलीन झाले व त्या सर्वांचे एक सुसंवादी राष्ट्र बनले. 


ग्रीसची व रोमची संस्कृती व्हेंडॉल व गाँध यांनी नष्ट केली,पण मोंगोलियनांनी तसे केले नाही.त्यांनी चिनी संस्कृती तर नष्ट नाहीच केली;पण उलट स्वतःच ती स्वीकारली.कुब्लाईखान हा चेंगीझचा नातू.कुब्लाई हा चीनच्या सांस्कृतिक,ज्ञानोपासक व कलोपासक परंपरेचा ऋणी आहे.स्वतःच्या रानटी पूर्वजांच्या चालीरीतींपासून त्याला काहीही मिळाले नाही.त्याचे मन व त्याची ही चिनी संकृतीवरच पोसली गेली.


या कुब्लाईखानच्या दरबारात राहिलेल्या मार्को पोलो च्याद्वारा आशियातील आश्चर्यकारक संस्कृतीशी युरोप परिचित झाले.मार्को पोलो कुब्लाईकडे का आला व राहिला? त्याचे कार्य आर्थिक व धार्मिक असे द्विविध होते.युरोप चीनशी व्यापार सुरू करू इच्छित होते; आणि पोप चीनला ख्रिश्चनधर्मी करू इच्छित होता. मार्को पोलो हा व्हेनिसचा रहिवासी,त्याचे वडील व चुलते चीनशी व्यापार करीत.वडिलांचे नाव निकोलो पोलो व चुलत्याचे मॅथ्यू किंवा मफ्फेओ पोलो.चिनी सम्राट कुब्लाईखान याने या दोघा युरोपियन व्यापाऱ्यांस आपल्या दरबारी बोलावले.त्याने त्या वेळेपर्यंत युरोपियन ख्रिश्चन व्यापारी पाहिला नव्हता.ख्रिश्चन व्यापारी हा कसा काय प्राणी असतो,हे त्याला पाहायचे होते.हे दोन्ही व्हेनिशियन व्यापारी त्याच्या दरबारी आले. कुब्लाईला ते आवडले.निकोलो मोठा हुशार;पण जरा काळसर रंगाचा होता.तो हिऱ्यांचा तद्वतच तलवारीचा पारखी होता.त्याचा भाऊ मफ्फेओ उंच व धिप्पाड होता.त्याची दाढी लाल रंगाची होती.तो घोड्यांचा तद्वतच स्त्रियांचाही पारखी होता.त्या दोघांचाही असंस्कृत व रंगेल स्वभाव,वाटेल तेव्हा देवाशपथ म्हणण्याची त्यांची सवय व मोकळी वृत्ती पाहून सम्राटाला गंमत वाटली.त्याने त्यांच्याशी व्यापारी चर्चा केली,तीवरून ते चांगलेच हुशार आहेत असे त्याला आढळून आले.त्याने त्यांच्याशी धर्म व राजकारण यांचीही चर्चा केली,तेव्हा त्या बाबतीत मात्र ते मूर्ख व अडाणी असल्याचे दिसून आले.

दोघांनीही सम्राटाला ख्रिश्चन करण्याची पराकाष्ठा केली.साऱ्याच मोंगोलियनांना ख्रिश्चन करावे अशी पोपची इच्छा होती.


कुब्लाईखान त्या दोघांना म्हणाला,"आपण काय बोलतो हे ज्याला नीट समजते असा कोणी ख्रिश्चन धर्मी आला, तर त्याच्याशी मी चर्चा करीन व ख्रिश्चन धर्म काय आहे ते पाहीन.म्हणून तुम्ही पोपकडे परत जा;व ख्रिश्चन धर्माचे शंभर उपदेशक इकडे पाठवायला त्याला सांगा. ते सुसंस्कृत,सर्व ललितकलांशी परिचित व नीट वादविवाद्कुशल असावेत.सर्व मूर्तिपूजकांस तद्वतच इतरांसही ख्रिस्ताचा कायदाच सर्वोत्कृष्ट आहे,हे त्यांना पटवून देता आले पाहिजे." निकोलो व मॅफ्फेओ पोपकडे जाण्यास निघाले.पण ते युरोपला पोहोचण्यापूर्वीच पोप मेला होता व कॅथॉलिक चर्चमध्ये मतभेद माजले होते,त्यामुळे दोन वर्षांपर्यंत नवीन पोपचीही निवड झालीच नव्हती.चिनी सम्राटाची इच्छा ऐकताच नव्या पोपने शंभर सुसंस्कृत धर्मतज्ज्ञ पाठविण्याऐवजी साधू डॉमिनिक याने स्थापलेल्या संप्रदायांतील दोन मूर्ख डोमिनिकना पाठविले.साधू डॉमिनिक हा स्पेनमधला सेंट फ्रेंन्सिसचा समकालीन संत होता.सेंट डॉमनिक याचा खाक्या सेंट फ्रेंन्सिसपेक्षा अगदी निराळा होता.तो लढाऊ वृत्तीचा होता,संकुचित ख्रिश्चन धर्माचा पुत्र होता.जिभेने लोकांना एखादी गोष्ट पटवून देता येत नसे,तेव्हा तो तलवार हाती घेई.तो एकदा नास्तिकांना म्हणाला, "तुम्ही ख्रिश्चन धर्मात आपण होऊन न याल,तर तुम्हाला त्यात हाकून नेण्यात येईल.कितीतरी वर्षे मी तुम्हाला उपदेश करीत आहे,गोड शब्दांनी सांगत आहे,तुमची मनधरणी करीत आहे,डोळ्यांत पाणी आणून तुमचे मन वळवू पाहत आहे.आमच्या स्पॅनिश भाषेत म्हण आहे,की जिथे गोड शब्दांनी काम होत नाही, तिथे ठोसे यशस्वी होतात; आशीर्वाद विफल झाले तरी आघात मात्र सफल होतात. अर्थात,आम्ही राजे,महाराजे,पोप,धर्मगुरू,सारे तुमच्याविरुद्ध उठवू.ते फौजा घेऊन तुमच्या देशावर चालून येतील व प्रार्थना निरुपयोगी ठरल्या,तिथे प्रहार विजयी होतील."


'मानवजातीची कथा,हेन्री थॉमस,अनुवाद-सानेगुरुजी, मधुश्री पब्लिकेशन'


अशा वृत्तीचे ते दोन डेमिनिकन ख्रिश्चन वीर निकोलो व मफ्फेओ यांच्याबरोबर कुब्लाईला 'ख्रिस्ताचा धर्म कन्फ्यूशियसच्या धर्मापेक्षा श्रेष्ठ आहे.' हे पटवून देण्यासाठी आले.त्या दोघांप्रमाणेच आपला मुलगा मार्को यालाही निकोलोने आपल्याबरोबर आणले होते. मार्को ऐन उमेदीत होता.त्याला धर्माची आवड होती, तशीच व्यापाराचीही हौस होती.त्याला बरोबर नेले,तर कुब्लाई चांगला ख्रिश्चन होईल,मार्कोही चांगला व्यापारी होईल व चर्चच्या फायद्याप्रमाणेच स्वतःचा स्वार्थही साधेल,असे निकोलो व मफ्फेओ या दोघांनाही वाटले.या वेळेस ते व्हेनिसपासून चीनपर्यंत खुष्कीने गेले.हा प्रवास दीर्घ,कठीण आणि धोक्याचा होता.पर्वत ओलांडायचे,वाळवंटे उल्लंघायची,याला कंटाळून ते दोघे मिशनरी परत गेले;पण मार्को,त्याचे वडील व त्याचे चुलते हे तिघे मात्र संकटास न जुमानता पुढेपुढे चालले, ते जेरुसलेम येथे थांबले; व तेथील ख्रिस्ताच्या समाधीपुढील नंदादीपातील तेल त्यांनी बरोबर घेतले. कारण त्या तेलाने सारे रोग बरे होतात,अशी समजूत होती.त्या मोंगोलियन सम्राटाचा हृदयपालट करायला

आपल्यापाशी धर्मोपदेशक नसले,तरी निदान हे तेल तरी आहे अशी आशा तर त्यांना होतीच;पण शिवाय मार्का तरुण,देखणा व गोड वाणीचा असल्यामुळे तो शंभर शहाण्यांची उणीव भरून काढील असे त्यांना वाटत होते.मार्को कब्लाईला चुकीच्या धर्मापासून परावृत्त करील अशी श्रद्धा,असा विश्वास त्यांना होता.पण त्या पोलोची ही समजूत म्हणजे हास्यास्पद अहंकारावाचून दुसरे काय होते? व्यापारात यशस्वी होत असल्यामुळे आपण जे जे हाती घेऊ, त्यात यशच मिळेल असे त्यांना वाटे.माकोंच्या मदतीने आपण केवळ आपल्या पेट्याच सोन्याच्या नाण्यांनी भरू असे नव्हे,तर स्वर्गही कोट्यवधी चिनी-ख्रिश्चनांनी भरून टाकू अशी अहंकारी आशा करीत ते येत होते.


साडेतीन वर्षे प्रवास करून ते चीनला पोहोचले. कुब्लाईखानाच्या दरबारी ते सोळा वर्षे राहिले. त्यांनी लाखो रुपये मिळविले; पण एकाही माणसास ख्रिश्चन करून स्वर्गात पाठविण्याचे काम त्यास करता आले नाही.


पाश्चात्त्य संस्कृतीचा परिणाम तर कुब्लाईखानावर झालाच नाही;पण उलट कुब्लाईनेच पौर्वात्य संस्कृतीचा खोल ठसा माकोंवर उठविला.मार्को युरोपियन व ख्रिश्चन होता तरी,कुब्लाईने त्याला एक बडा अधिकारी म्हणून नेमले. तेराव्या शतकातील चिनी आजच्या युरोपियनांपेक्षाही उदार व विशाल दृष्टीचे होते.१९३५ साली एखाद्या कन्फ्यूशियस किंवा बौद्ध धर्माच्या चिनी माणसाला इंग्लंडमध्ये महत्त्वाची सनदी नोकरी मिळणे कितपत संभवनीय वाटते ? कल्पना करा.


मार्को पोलो व्हेनिसला परतला,तेव्हा व्हेनिस व जिनोआ यांच्या दरम्यान चाललेल्या आरमारी लढाईत त्याने भाग घेतला.ही लढाई १२९८ साली झाली.जिनोईजनी मार्कोला कैद केले.तुरुंगात वेळ घालविण्यासाठी व बरोबरच्या कैद्यांची करमणूक व्हावी म्हणून तो आपला पूर्वेकडील वृत्तांत रस्टिसिआनो नामक एका लेखकाला सांगून लिहवून घेऊ लागला.'मार्को पोलोचे प्रवासवृत्त' या नावाने रस्टिसिआनोने तो वृत्तांत पुस्तकरूपाने प्रसिद्ध केला.हे पुस्तक चौदाव्या शतकातील फार खपणाऱ्या पुस्तकांपैकी एक होते.मार्को जरा अतिशयोक्ती करणारा होता.तो प्रवासी व्यापारी व हिंडताफिरता विक्रेता होता व असे लोक कसे बोलतात, कायकाय गप्पा मारतात हे सर्वांस माहीतच आहे.लाखो हिरेमाणके,लाखो मैल सुपीक जमीन,लाखो सोन्याची नाणी,आश्चर्यकारक स्त्री-पुरुष,इत्यादी नानाविध गोष्टींविषयी तो अतिशयोक्तीने बोलतो व लिहितो. त्याच्या या अतिशयोक्तीपूर्ण लेखनपद्धतीमुळे लोक त्याला 'लाखोंनी लिहिणारा मार्को,लक्षावधी मार्को' असे थट्टेने म्हणत.आधीच मार्कोची अतिशयोक्ति व तीत आणखी रस्टिसिआनोच्या अलंकाराची भर पडताच अशी एक नवलपूर्ण कथा जन्मास आली की, ती वाचताना आपण एखाद्या जादूगाराच्या सृष्टीत किंवा पऱ्यांच्या अथवा गंधर्वांच्या नगरीतच आहोत असे वाटते;पण ही अतिशयोक्ती व हे अलंकार वगळताही मार्को पोलोचे हे पुस्तक उत्कृष्ट आहे यात शंकाच नाही. ते इतिहासयुगात नवयुग निर्माण करणारे आहे. स्वतःच्या संस्कृतीहून वेगळ्या दुसऱ्याही संस्कृती आहेत, आपल्या देशाशिवाय दुसरे देशही आहेत,असे या ग्रंथाने युरोपियनांस शिकविले व त्यांची दृष्टी या अन्य संस्कृतींकडे व देशांकडे वळविली.या पुस्तकाने मध्ययुगातील झापड पडलेल्या मनाला जागृत केले.जागृत करणाऱ्या अनेक कारणांपैकी मार्को पोलोचे प्रवासवृत्त हे एक महत्त्वाचे कारण आहे.या ग्रंथामुळे मध्ययुगातील युरोपीय मनासमोरचे क्षितिज विस्तृत झाले व त्याला पूर्व व पश्चिम यांमध्ये विचारांची व वस्तूंची अधिक उत्साहाने देवघेव व्हावी;व व्यापारी आणि संस्कृती संबंध वाढावेत असे आतून वाटू लागले.जग अधिक मोठे झाले,जगाचा अधिक परिचय झाला, मानवजात अधिक जवळ आली, पूर्वे कडे जाण्यासअधिक सोपे व जवळचे रस्ते शोधून काढावेत असे युरोपियनांस वाटू लागले व या प्रयत्नांतूनच अमेरिका त्यांना एकदम अचानक सापडली

.युरोपियनांनी चिनी लोकांची बंदुकीची दारू घेतली.चिनी लोकांनी ती शोधून काढली,पण ती केवळ शोभेसाठी व मुलांच्या खेळासाठी वापरली. युरोपियनांनी ती युरोपात नेली व तिच्यापासून मरणाचे प्रभावी साधन तयार करून तिचा युरोपीय युद्धांत प्रचार केला.


एक महत्वाची नोंद...


आमचे मार्गदर्शक  मल्हार लोखंडे सर यांच्याकडून आलेली


विचारच तयार होत असताना मनंच तिथे अज्ञान पूर्व असते. तेव्हा हे घडतं . ई. पॉल टॉरेंसच्या मते...वेगवेगळ्या चिंतन स्थितीतून विचारांची निर्मिती होते तेव्हा ते विचार -नवीन व मौलिक, विचारांचा प्रवाह, विचारा- विचारांच मदत कार्य-लवचिकता,  विचारांचे वास्तव आणि विचारांचा विस्तार,

*********************

ग्राहम वालेस 

समस्या एकटीकरण,

अव चेतन मन, परीक्षणपूर्वक स्थितीत जन्मजात वातावरण चिंतन व विचार स्थिती प्राप्त होते तेव्हा...

जन्मजात वातावरण,

मानवाच्या उजव्या बुद्धीतील कलात्मक कल्पना जागृत होतात,तेव्हा जाणीवपूर्वक क्षमता विचारांची जबाबदारी घेतात व त्या आत्मविश्वासपूर्वक स्वतंत्र विचारांना जन्म देतात तेव्हा ते विचार अज्ञानाचे ज्ञानात रूपांतर करते. तेथेच सृजनता घडते....जे.पी गिल्फोर्ड

असे त्यांचेही मत टाॅरेंस सोबत जुळते....



७/१२/२५

पक्षिगान / birdsong

पक्ष्यांच्या सौंदर्याचं रहस्य मानवाला ऋग्वेदकालापासून वाटत आलं आहे.'परमेश्वररूपी सुंदर पक्ष्याचे गूढरम्य रूप ज्या कोणास ठाऊक असेल त्याने ते मला सांगावे.' अशा अर्थाची एक सुंदर ऋचा ऋग्वेदात आहे. परंतु हे गूढरम्य रूप महाकवी कालिदासाला अंशतःउलगडले असावे.शकुंतलेच्या अलौकिक सौंदर्याचे वर्णन करताना तो म्हणतो,"मनुष्यकुळात अशा रूपाचा संभव होणे कसे शक्य आहे ? अशी तेजस्वी ज्योती जमिनीतून कशी उगवेल ? सौंदर्यातूनच सौंदर्य जन्माला येते." शकुंत पक्ष्याने जिचा लहानपणी सांभाळ केला अशा त्या स्वर्गकन्येला पक्ष्याचे सुंदर रूप लाभले होते.


पशूना रंग लाभले असले तरी ते फक्त त्यांच्या स्वतःच्या संरक्षणासाठी असतात.परंतु पक्ष्याचे रंग-रूप पाहिले की त्या अपार्थिव सौंदर्याचा हेवा वाटतो.त्यांच्यात दिसून येणारी रंगारूपाची विविधता इतरत्र दुर्मीळ आहे. 


ऋतुमानाप्रमाणे बदलणारे त्यांचे रंग किती अद्भुत सुंदर असतात ! वसंत व हेमंतातील त्यांचा पेहराव,प्रणय कालातील त्यांचे मुलायम रेशमी अवगुंठन,दूरच्या प्रवासासाठी लागणारे कोट व घागरा आणि इतर वेळचा साधा-सोज्वळ पोशाख.सुंदर पाखरांना कोणती गोष्ट शोभत नाही ?


आकाश जसे इंद्रधनुष्याच्या रंगाने शोभते,तसेच वनश्री पक्षिरूपी इंद्रजालाने गूढ वाटते.त्यांच्या रंगाची किमया अद्भुतरम्य आहे.पक्षी हे निसर्गाला पडलेले सुंदर स्वप्न आहे.सृष्टीतील अलौकिक वर्ण त्याने पक्ष्यांना मुक्त हस्ताने बहाल केले आहेत.हिरव्या वनश्रीतून विद्युत् गतीने निळ्या रेषा ओढणारा खंड्या,निळ्या आकाशाचा भार पेलवत उडणारे निळे चास,फुललेल्या पिवळ्या जर्द बहावा वृक्षाशी स्पर्धा करणारे हरिद्र,शिरीष पुष्पासारखे कोमल हारित,पाचूच्या पूजापात्रातील मोत्याच्या शिंपल्याप्रमाणे शोभणारी कमळाच्या पानावरील बगळी,रंगीबेरंगी पोशाख केलेल्या सुंदर मुलींच्या घोळक्याप्रमाणे वाटणाऱ्या देखण्या तेजस्वी सैरा-गोल्ड फिच-पक्ष्यांचा थवा,नभश्रीच्या कंठातील पाचूचा व माणकांचा कंठाच ओघळत आहे अशी वाटणारी पोपटांची आकाशातून उतरणारी रांग, एखाद्या गौरांगीप्रमाणे दिसणारे चक्रवाक,मत्त चांदणे पिऊन अरण्याकडे पाहात पाहात जाणाऱ्या गुलाबी-बदामी चकोर पक्ष्यांचा समूह,हिमाच्छादित शिखराची आठवण करून देणाऱ्या तुषार तित्तिरांचा थवा,

कर्पूरगौर वर्णाचे शाही बुलबुल,रत्नाचे सौंदर्य लाभलेला पाचू कवडा,मुहे खोऱ्याचे वैभव असलेले पारवे,एखाद्या रूपवती नागकन्येप्रमाणे फूत्कार टाकणारे सुंदर पंखांचे हुदहुद,उंच पर्वतातील पठारावरील गवताच्या निळ्या फुलांच्या मखमली गालिचांवरून हारीने चालणाऱ्या रूपवती शामल कोकणी लावा,काळ्या पांढऱ्या जुन्या पद्धतीच्या पोशाखातील करकोचे,

उन्हाळ्यातील मावळत्या दिशेप्रमाणे दिसणारे धूसर वर्णांचे कपोत,वर्षाऋतूतील सूर्यास्ताप्रमाणे दिसणारे सुंदर पंखांचे तित्तिर,पहाटेच्या ताऱ्यांचा वर्ण असलेले कलविंक पक्षी,

जलाशयावर विहार करणाऱ्या रोहित पक्ष्यांचा क्षणोक्षणी बदलत असणारा व गुलाबी दुपट्याप्रमाणे दिसणारा दाट थवा पाहून निसर्गाच्या अत्यद्भुत किमयेची प्रचीती येते.


एखाद्या शापभ्रष्ट परीप्रमाणे हिमालयात राहणाऱ्या जीवजीवक पक्ष्यांच्या पिसाऱ्याला इंद्रधनुष्याच्या रंगाची उपमा द्यावी इतके ते सुंदर व मनोहर असतात.


फुले पाहिली की मला पाखरांची आठवण होते;आणि पक्षी दिसले की रानफुलांचे स्मरण होते. कुर्गच्या घनदाट किर्र जंगलातून जाताना सूर्याचे किरणही दृष्टीला पडत नसत.रंगीबेरंगी पक्षी मोठ्या चपळतेने उडताना दिसत.त्या अंधुक प्रकाशात ह्या थरथरणाऱ्या ज्योती आहेत असे वाटे.कोठून तरी येणाऱ्या देदीप्यमान, तेजःपुंज दिव्याच्या ज्योतीसारखे क्षणार्धात दिवा मालवल्याप्रमाणे नाहीसे होत,आणि तिथला अंधार मात्र वाढलेला असे.गंधर्व स्त्रियांचे रूप मुळातच अलौकिक ! त्यांना देखील पक्ष्यांचे रूप घेण्याचा मोह आवरत नसे.पक्षी हे अलौकिक सौंदर्य लाभलेल्या स्त्रियांचेप्रतीक आहे. 


अगस्ति ऋषींची पत्नी लोपामुद्रा हिला लोपा-सी गल-पक्ष्याचे रूप लाभले होते.मिस तू ही प्राचीन चिनी साहित्यातील लावण्यमयी स्त्री.तिच्या सुदर मानेला उबदार मुलायम अशा अलबॅस्टर पक्ष्यांची उपमा दिली ती यथोचित वाटते.निळावंती त्यांच्या भाषेलाही रंगाचीच उपमा दिली आहे.


सामगान अतींद्रिय ज्ञान व त्यांचा मनोहर पिसारा यांनी जरी पक्ष्यांच्या सौंदर्याला रहस्याचा आविष्कार होत असला तरी त्यांची व्यक्त होत असलेली गूढतम चारुता इथच थांबत नाही.ती त्यांच्या प्रसवकाळात गूढ आचरणाच्या पडद्या

आडून घरट्याच्या रूपाने डोकावत असते.विणीच्या काळाइतका समृद्धीचा-सौंदर्याचा काळ निसर्गात नाही! हे समृद्धीचे सौंदर्य चैत्राच्या नव्या पालवी बरोबर येते.ते पाना-फुला-फळाप्रमाणे बहरत जाते.


कुठल्याही प्राण्याला पक्ष्यांच्या घरटी बांधण्याच्या कुशलतेशी बरोबरी करता आली नाही,इतकी ती देखणी असतात.याला अपवाद आहेत घारी-गिधाडांच्या कुलातील हिंस्र पक्ष्यांची घरटी.एखाद्या सुंदर वनश्रीत बेढब लष्करी तळ उभारावा ना तसं ह्या शिकारी,युद्धपिपासू पक्ष्यांची खोपी पाहून वाटते. तुषाराच्छादित पर्वतातील सहा-सात पांढुरकी घरकुलं शिलाखंडावरील एखाद्या पक्ष्याच्या घरट्यासारखी रमणीय दिसतात,तर कच्छच्या रणातील रोहितपक्ष्यांच्या खोपी आकाशातील कुणा एका गंधर्वनगरीची आठवण करून देतात.

काबूल-कंदाहारच्या विस्तीर्ण जलाशयाकाठी पाहिलेली पक्ष्यांची शेकडो लक्षावधी घरटी बाबरसारख्या शूर वीराच्या स्मृतीतील फुले बनून राहिली.तिबेटात घराच्या छपरावर,मठा-मंदिरावर चक्रवाक पक्ष्यांची युगुले घरटी बांधून तिथल्या लोकांच्या अहिंसा व धर्मपरायणतेची आठवण करून देतात.एरवी कावळ्याचा आवाज किती कर्कश ! पण ज्यांनी घरट्यात बसलेल्या कावळीचा आवाज ऐकला असेल तो त्या आवाजाने विचलित झाल्याशिवाय राहणार नाही. केवढा अद्भुत स्वर तिच्या कंठातून स्रवतो ? एखाद्या हरिद्र पक्ष्याच्या आर्द्र स्वरासारखा.हिमालयात पॉपलर,विलो व चिनारच्या पुरातन वृक्षांवर तसेच पर्वताच्या शिखरावर अनेक चास पक्षी घरटी करतात.देदीप्यमान निळ्या पंखांचे हे पक्षी घरट्याकडे गूढ स्थळी ठेवलेल्या आपल्या पिलांकडे झेप घेत उडत असता वाटते की ही निळी पाखरे जणू निळ्या गगनाचा भारच घेऊन उडत आहेत.आपल्या छातीच्या पिसात पिलासाठी पाणी साठवून वैराण वालुकामय प्रदेशातून शेकडो मैल उडत घरट्याकडे जाणारा भट तित्तिराचा थवा सांजसकाळ कुणी पाहिला आहे काय ? मोठे विस्मयजनक दृश्य असते ते !


पक्ष्यांची घरटी अद्भुत व आनंददायी सौंदर्याचा जणू निधीच आहे.जी आपल्या प्राचीन ऋषिमुनींच्या,संत,कवी व तत्त्वज्ञान्यांच्या चिंतनाचा विषय न होतील तरच नवल!


ऋग्वेदात या निधीचे मोठे मार्मिक वर्णन केले आहे.हे वरुणा,घरट्याकडे झेप घेणाऱ्या पक्ष्यांप्रमाणे माझ्या साऱ्या कामना धनप्राप्तीस्तव तुझ्याकडे धाव घेत आहेत.या समृद्धीबरोबर गूढताही नांदते.घरट्यामधील अंड्यातून नुकत्याच उबविलेल्या पिलांची व सोमाची तुलना केली आहे,ते मोठे लक्षणीय आहे.'पक्ष्यांच्या पिलाप्रमाणे गूढ स्थळी ठेवलेला,निधीप्रमाणे मौल्यवान, स्वर्गाहून आणलेला आणि दगडात झाकलेला सोम इंद्राने प्राप्त केला.'


'प्राणिमात्राच्या संगोपनाचा आदर्श पक्ष्यांची घरटीच आहेत.इतकेच काय यज्ञासनासारखे पवित्र आसन देखील पक्ष्यांच्या घरट्याप्रमाणेच मृदू आहे.'घरट्यातील पक्ष्यांची पिले चारा घेऊन येणाऱ्या आपल्या मातापित्यांची किती आतुरतेने वाट पाहतात याची तुलना सोम प्राशन करण्यापूर्वी स्तवन करणाऱ्या भक्तजनांच्या प्रतीक्षेशी केली आहे.'हे इंद्रा,उबदार घरट्यातील पक्ष्यांप्रमाणे दधी व दुग्धमिश्रित सोमयुक्त निवासस्थानातील भक्तजन तुझे स्तवन करीत आहेत.'


शत्रू दूर जातात ते पुन्हा परत येण्याकरिता हे अनादी सत्य सांगताना म्हटले आहे,'हे वज्रहस्त इंद्रा,पक्ष्यांना घराबाहेर काढणाऱ्या सूर्याप्रमाणे त्रासदायक शत्रूना तू दूर हाकलतोस.'


सुगरण पक्ष्याचे घरटे सर्वांना परिचित आहे.परंतु यजुर्वेदात त्याचे सुंदर वर्णन केले आहे.'नम्रतेसाठी लव्हाळ्याकडे पहा व कारागिरीसाठी सुगरण पक्ष्यांकडे पहा.'


जीवनातील जे जे गूढ,मृदू,ऋजू,मौल्यवान,सुंदर व सर्जनशील होते ते सारे पक्ष्यांच्या घरट्याभोवती गुंफण्याइतकी सौंदर्य व समृद्धीची दृष्टी प्राचीनांकडे होती हे केवढे आश्चर्य ! जीवनावरील आत्यंतिक प्रेमाचे प्रतीक घरटे आहे.


उषा पक्ष्यांचे दिव्य संगीत घेऊन येते.सारे आकाश वनोपवने पक्ष्यांच्या नित्य नवीन,आगळ्या सुस्वर गीतांनी भरून जातात.

हेमंतात पहाटेपूर्वीच्या काळोखात आकाशमार्गाने वेगात जाणाऱ्या वन्य बदकांच्या अकस्मात येणाऱ्या स्वरांची विलक्षण मोहिनी पडते.पावसाळ्यात लावा पक्ष्यांमुळे खूप बहार येते.त्यांचे प्रणयगीत साऱ्या दऱ्याखोऱ्यांत सप्त सुरांसारखे भरून जाते.

माझ्यापासून अगदी जवळ वृक्षाच्या बुध्यावर उभी राहून लाविया गात होती.अर्ध्याअधिक फर्लांगावरून अनेक नर तिला साद देत होते.त्यांचे ते प्रीतीचे अवर्णनीय सामगान उच्च स्वराला पोहोचले तेव्हा ते कानाला मोठे गोड वाटले.


जंगलाचं देणं,मारुती चितमपल्ली,प्रकाशक-साहित्य प्रसार केंद्र, सीताबर्डी, नागपूर


सुतार पक्ष्याच्या चंद्रमौळी कोटरातून मावळतीकडील मृग-व्याधाचा तारकापुंज मंद प्रकाशताना दिसत होता.तो पक्षी अरण्यभर डम् डम् डमरू वाजवत एका वृक्षावरून दुसऱ्या वृक्षावर संचार करीत होता.


सुंदर व आरस्पानी जलाशयाचा काठ 'विलो' वृक्षांनी रेखिला आहे.जणू गंधर्व नगरीतल्या नाजूक कटीच्या अप्सराच त्या.मंद वायुलहरीबरोबर त्यावर हिरव्या पाचूचे नाजूक तरंग उठत आहेत.पिवळेजर्द हरिद्राव पक्षी लवचिक फांद्यांतून सुस्वर गात आहेत, पाठशिवणीचा खेळ खेळत आहेत.त्यांचे लोभस व देखणे प्रतिबिंब पाण्यात पडले आहे.हरित लाटेवर विरलेले त्यांचे स्वर अंतःकरणाच्या सीमा अमर्याद करून टाकतात.प्रभातसमयी न्हाऊन नटलेल्या सुंदर युवतीचे दर्शन व्हावे तसे हारिताकडे पाहून वाटते. गोजिरवाणी, सुंदर व शिरीष पुष्पासारखी कोमल अशी ही पाखरे गुंजन करू लागली की अस्फुट ओठ उघडलेल्या सुतनूची आठवण होते.आता ती कुठले गीत गाणार ? गत स्मृतीतील कुठली विराणी छेडणार ?


या त्यांच्या अनुनय गीतांत गिरिगव्हरातून येणाऱ्या श्यामा व पल्लवपुच्छाचेही स्वर मिळालेले असतात.


धिटुकल्या रानचिमण्या,वनातील भाट पक्षी,बुलबुल, दयाळ जरा उशिराने जागे होतात.त्यांना माणसाच्या बंदुकीची व उनाड पोरांच्या गलोलीची भीती वाटत नाही.स्वभावतःभीरू असलेली ती पाखरे एखाद्या घरंदाज गायकाप्रमाणे अरुणोदयापूर्वीच आपली हजेरी लावून वनोपवनात अदृश्य होतात.


आता शाही बुलबुल इथं नाही.ह्या कर्पूरगौर स्वर्गीय पक्ष्याने हिमालयातील अद्भुत स्वर स्वतःबरोबर आणले होते.ते आगळे सूर विसरलेल्या कवितेतील अर्ध्यामुर्ध्या आठवणाऱ्या चरणाप्रमाणे माझ्या मनात येरझारा घालू लागतात.त्यांनी माझ्या जीवनातील दिवस आणि रात्री चिरसंपन्न केल्या आहेत.


संध्या तित्तिर पक्ष्याच्या सुंदर पंखांचे लेणे लेवून येते.दूर पर्वतावरील पारदर्शक धुक्यात दऱ्याखोरी,वनश्री,नदी, ओहोळ आणि गाव लपेटला आहे.किलिकिल्किलीच्या उच्च स्वराने तित्तिर जणू थोड्याच वेळात काळोखात परिणत होणाऱ्या ह्या मनोहर दृश्याला निरोप देत आहे.


"ईश्वरा,तू चराचरी व्यापून राहिला आहेस!"


५/१२/२५

हास्य एक देणगी / Hasya Ek Dengi 

अंत:करणाला हास्य एक चांगलं औषध आहे.आपल्या

जगाला तर या औषधाची निकडीची गरज  फार मोठ्या प्रमाणात आहे.


ऐशीच्या घरात वय झालं असतांना तुम्ही स्मृती आणि माणसाची मरणाधीनता यांत गुंतता.मी माझ्या कार्यालयात बसलो होतो.खूप चांगल्या आठवणी येत होत्या.मनात विचार चालला होता, आणि माझं मन मागेमागे जातं रेड स्टीव्हन्सशी थबकलं.विधीमहाविद्यालयातून मी बाहेर पडलो होतो आणि माझं कार्यालय थाटलं होतं.पाटीवर नाव झळकत होतं,हॅमिल्टन अ‍ॅण्ड असोसिएटस्. पैकी असोसिएटस् हा वस्तुस्थितीपेक्षा इच्छेचा भाग होता.मी प्रत्येक दिवसाचा बराच भाग एकट्यानेच घालवत होतो. ( सर्वोत्तम देणगी,जिम स्टोव्हॅल, बिलिंग्ज,अनुवाद - दिशा केळकर EMBASSY BOOK DISTRIBUTORS )


एक दिवस बाहेरच्या दाराची घंटा वाजली.अर्धवेळ काम करणारी माझी सेक्रेटरी काम करून गेली होती,म्हणून उठलो आणि घाईने जाऊन कोण आलंय ते बघायला दार उघडलं.

दारात एक जोरकस व्यक्तिमत्त्वाचा माणूस उभा होता.त्याचं नाव रेड स्टीव्हन्स होतं हे मला नंतर कळलं.त्यानं मला सांगितलं की तो टेक्ससमधला तेल आणि गुरंढोरं ह्या क्षेत्रांमधला मोठ्ठा माणूस होणार होता आणि तो एका चांगल्या कायदेतज्ज्ञाच्या शोधात होता. अमेरिकेतल्या उत्तम विधीमहाविद्यालयाकडे त्याने चौकशी केली होती आणि आदल्या वासंतिक सत्रात मी पहिल्या क्रमांकाने पदवी परीक्षा पास झालो होतो.पुढे माझ्या ओळखीचं आणि आवडीचं झालं तसलं मोठं हसू हसत तो गरजला,"म्हणून मला वाटलं जगायला उत्तम कायदेतज्ज्ञ आणि जगातला उत्तम तेल आणि गुरंढोरं तज्ज्ञ एकत्र आलेच पाहिजेत."


त्या घटकेला मी केवळ विधिमहाविद्यालयातून नुकताच बाहेर पडलेला आणि कोणी अशील नसलेला असा कायदेतज्ज्ञ होतो,तर त्या तेल आणि गुरंढोरं यातल्या उत्तम माणसाकडे या दोन्हींमधलं काही नव्हतं,पण आम्हाला त्याची फिकीर वाटली नाही.ते असं सहजपणे सुरू झालं आणि त्याला कायमच्या व्यावसायिक आणि व्यक्तिगत मैत्रीचं स्वरूप आलं.मिस हेस्टिंग्जनं माझ्या कार्यालयात डोकावून सांगितलं की जेसन आम्हा दोघांची कॉन्फरन्स रूममध्ये वाट पहातो आहे.आणि त्यामुळे माझ्या रेड स्टीव्हन्सबद्दलच्या विचारांमध्ये व्यत्यय आला.


नंतर व्हिडिओच्या पडद्यावर रेड आला आणि म्हणाला,"बारा महिन्यांच्या या उपक्रमांपैकी सहा महिने तू नीट पाडलेस,बरं का जेसन.परंतु तरी मी तुला आठवण करून देतो की एक मोठा टप्पा तू जरी ओलांडला असलास तरी तुला एक मोठा टप्पा अजून पार पाडायचा आहे.आणि अजूनही जर का तुझी वृत्ती किंवा वर्तणूक मिस्टर हॅमिल्टनच्या अपेक्षेनुसार नसली तर लगेच हा प्रवास थांबवला जाईल.मृत्यूपत्रात लिहीलेली सर्वोत्तम देणगीही तुला मिळणार नाही.


"या महिन्यात हास्य ही एक देणगी कशी असते हा एक धडा तुला शिकायचा आहे.या देणगीचा धडा शिकवतांना माझ्यापुढे नाईट क्लबमधला किंवा विनोदी सिनेमातला विदूषक नाही.तुमच्या स्वतःकडे,तुमच्या समस्यांकडे आणि एकंदरच सर्व गोष्टींकडे बघून त्यातून करमणूक करून घेण्याचं तुमच्या अंगी सामर्थ्य हवं.खूप लोक दुःखी जीवन जगत असतात,कारण त्यांच्या समस्या ते लोक मनाला फारच लावून घेत असतात.मागच्या सहा महिन्यात मला वाटतं तू शिकलास की जीवनात अशा काही गोष्टी असतात की त्या गांभिर्यानं घेत, मोलाच्या मानायच्या असतात.


"या महिन्यात तू अशी व्यक्ती शोधून काढायची आहे,की ती व्यक्ती खूप अडचणींनी वेढली असूनही,खूप आव्हांनांना सामोरं जात असूनही, हास्यवृत्ती हरवून बसलेली नाही.

संकटग्रस्त असूनही ज्यानं हास्यवृत्ती राखून ठेवली आहे,तो जीवनात सुखी होणारच."


"महिन्याच्या शेवटी मिस्टर हॅमिल्टन आणि मिस हेस्टिंग्ज यांना तू अहवाल द्यायचा.तुला सापडलेली अशी व्यक्ती,आणि त्यापासून तू हास्य ही एक देणगी असते याबद्दल काय शिकलास ते सांगायचं." 


रेड स्टीव्हन्स हसायला लागला,म्हणाला, "जेसन पूर्वीच्या काळात आम्ही ज्या विनोदी परिस्थितीत कधी कधी सापडायचो त्याबद्दल टेडला विचार एकदा." रेड स्वतःशीच हसत असतांना त्याची छबी पडद्यावरून दिसेनाशी झाली आणि पडदा रिता झाला.


जेसननं विचारलं, "कशाबद्दल बोलत होते ते, मिस्टर हॅमिल्टन ?"


मी हसलो आणि म्हणालो,"केव्हांतरी आणि कुठेतरी बोलू याविषयी आपण.पण सध्या तू गांभीर्यानं, हास्य ही देणगी कशी असते,याचा विचार कर."


मिस् हेस्टिंग्ज जेसनला घेऊन कार्यालयाबाहेर पडली.


आमच्या फर्मचा खाजगी जासूस रेगी टर्नर पुढचा महिनाभर गुप्तपणे जेसनच्या मागावर राहिला. रेगीनं सांगितलं की जेसनचा रोजचा सर्वसाधारण कार्यक्रम चालू होता आणि हास्य ही देणगी कशी असू शकते याचा शोध घेत असल्याची त्याच्यात काही बाह्य लक्षणं दिसत नव्हती.


महिन्याच्या अखेरचा दिवस आला,मिस् हेस्टिंग्जनं मला येऊन सांगितलं की दुपारी येऊ का असं जेसन विचारत होता.ठीक असल्याचं मी म्हटल्यावर ती म्हणाली की आज जेसन येतांना कोणाला तरी बरोबर घेऊन येणार आहे,असं तो म्हणत होता.


ठरलेल्या वेळी जेसनला घेऊन मिस् हेस्टिंग्ज माझ्या कार्यालयात आली.बरोबर एक तरूण मनुष्य होता आणि तो अंध असल्याचं स्पष्ट दिसत होतं. डोळ्यावर काळा चष्मा आणि हातात पांढरी काठी होती.तो अंध माणूस कार्यालयात इकडेतिकडे चालू लागल्याचं पाहून मिस् हेस्टिंग्ज अस्वस्थ झाली. आणि मलाही थोडीशी धास्ती वाटली,हे मी मान्य करतो.


जेसन म्हणाला, "मिस्टर हॅमिल्टन आणि मिस् हेस्टिंग्ज मी डेव्हिड रीजची ओळख करून देतो."


मिस्टर रीजने हात पुढे केला आणि म्हणाला, "खूपच दिवसात आपली दृष्टिभेट नाही."


माझी चिंता पार करून त्याच्या विनोदाचा आस्वाद घ्यायला मला थोडा वेळ लागला,मी मिस्टर रीजशी हस्तांदोलन केले आणि आम्ही सगळे खाली बसलो.


जेसननं खुलासा केला, "गेल्या आठवड्यात मी लोकलमधून जात असतांना मला डेव्हिड भेटला. आम्ही गाडीत खूप गप्पा केल्या आणि नंतर फोनवर खूपदा बोललो.मला वाटतं हास्याची देणगी असलेल्या माणसाचं हा उत्तम उदाहरण आहे.


डेव्हिड रीज एकदम बोलून गेला, "तरीच हा म्हणत होता की तुम्हा मंडळींकडे जरा हास्याचा तुटवडाच होता आणि म्हणून त्यानं इथ मला ओढतच आणलं."


डेव्हिडनं उजीवीकडे मान फिरवली आणि म्हणाला, "वा ! हे खरोखर सुंदर कार्यालय आहे."


मी म्हटलं, "आभारी आहे," मी त्याला माझ्या फर्निचरबद्दल सांगणार एवढ्यात माझ्या लक्षात आलं की स्वारी माझी फिरकी घेत होती आणि आम्ही सगळे हसलो.


मी जेसनला विचारलं, "या तरूणाला तू पहिल्यांदा भेटलास तेव्हा असं त्याच्यात तुला काय दिसलं, की तुला वाटावं,या माणसात हास्याची देणगी आहे?"


मधेच बोलणं तोडत डेव्हिड रीज म्हणाला, "सर, माझ्या मासिकाच्या युक्तीमुळे."


मी हसून म्हटलं, "अच्छा, ही मासिकाची युक्ती काय आहे बुवा ?"


डेव्हिड रीजन उलगडून सांगितल, "काही लोकलगाड्या जशा हव्या तशा स्वच्छ नसतात.मग जेव्हा बाकांवर धूळ असते,तेव्हा लोक मासिकांवर बसतात.बाक स्वच्छ आहे किंवा नाही हे मी जाणू शकत नसल्यामुळे मी नेहमीच मासिकावर बसतो. मी आणि जेसन जेव्हा ओळख करून घेत होतो, तेव्हा मागच्या सीटवरच्या माणसानं मला विचारलं की मी मासिक वाचतो आहे का ? त्याला बहुधा काहीतरी वाचयला हवं होतं."


या वेळेस जेसन खो खो हसायला लागला आणि बोलणं तोडीत म्हणाला, "त्या माणसानं डेव्हिडला 'तू ते मासिक वाचणार आहेस का ?' असं विचारल्याबरोबर डेव्हिड उभा राहिला आणि त्यानं पान उलटवलं आणि परत खाली बसत म्हणाला, "होय साहेब, पण लवकरच माझं ते संपेल."


आमचं हसणं ओसरल्यावर मी डेव्हिडला विचारलं, ही हास्यदेणगी त्यानं केव्हा आणि कशी कमावली. त्यानं सांगितलं की लहानपणीच त्यानं दृष्टी गमावली होती आणि त्यामुळे बऱ्याच आव्हानांना आणि संघर्षांना तोंड द्यावं लागलं होतं. त्यात लोकांकडून मिळणाऱ्या वाईट वागणुकीचाही वाटा होता.


तो म्हणाला, "मिस्टर हॅमिल्टन,जीवनात काही वेळा अशा येतात की तुम्ही एकतर हसता किंवा रडता. मी हसणं निवडलं."


मी डेव्हिड रीजचा विचार करायला लागलो.त्याचा जीवनविषयक दृष्टिकोन काय सही होता ! त्याच्या ह्या हास्यदेणगीचा फायदा त्याला एकट्याला नाही तर माझ्यासकट त्याच्या संबंधात आलेल्या सगळ्यांना वाटला जात होता.मी जेसनला म्हटलं की त्यानं त्या महिन्याला सोपवलेलं काम नक्कीच पूर्ण केलंय.


डेव्हिड रीजबरोबर जेसन कार्यालयातून बाहेर पडत होता.तो थांबला,मागे वळला आणि म्हणाला, "मिस्टर हॅमिल्टन, तुम्हांला सांगायचं राह्यलंच की तुम्ही घातलेला टाय फार सुंदर आहे.


मी त्याचे आभार मानायच्या बेतात होतो तेव्हाच लक्षात आलं की त्यानं माझी पुन्हा एकदा फिरकी घेतलीय. तो आणि जेसन हॉलमधून बाहेर पडून लिफ्टपर्यंत पोचले तोवर त्यांच हसणं ऐकू येत होतं. मिस् हेस्टिंग्ज पण हसत होती.


शेवटी मी तिला विचारलं, "तू कशासाठी हसते आहेस?"


तिनं उत्तर दिलं, "अं, टाय सुंदर आहे खरा !"



३/१२/२५

अक्षय्यतेचा नियम / Law of Inexhaustibility

आणि लव्हायेजेनं 'खडूचे आम्ल'असं नाव दिलेली 'बद्ध हवा' हा चौथा प्रकार असे ते हवेचे प्रकार होते. जोसेफ ब्लॅकन याचा शोध २५ वर्ष अगोदर लावला होता.काही काळानंतर शास्त्रज्ञ 'ही श्वसनाद्वारे घेता येणारी हवा सर्व आम्लाचा मुख्य भाग आहे' अशा निष्कर्षापर्यंत आले.हा दृष्टिकोन नंतर चुकीचा दाखवला गेला तो हायड्रोक्लोरिक आम्लाच्या उदाहरणाद्वारे.मात्र १७७९ मध्ये लव्हायेजेनं आम्ल निर्माण करणारा अशा अर्थी ग्रीक शब्दावरून 'ऑक्सिजन' हे नाव सुचवलं. ग्रीकमध्ये 'ओक्सु' म्हणजे आम्ल आणि 'जीन' म्हणजे बनवणारा. लव्हायेजेनं ऑक्सिजनाचा कार्बनबरोबर संयोग होऊन 'स्थिर हवा' (कार्बन डाय ऑक्साइड) तयार होते' असं दाखवलं.लव्हायेजेनं १७८७ मध्ये या वायूला 'कार्बोनिक आम्ल वायू' असं नाव दिलं. लव्हायेजेनं दुसऱ्या एका प्रयोगात हिरा ऑक्सिजनच्या सान्निध्यात जाळला असता त्याचे कार्बन डाय ऑक्साइडमध्ये रूपांतर होते असं दाखवून दिलं.खरं पाहता साधारण १७० वर्षांपूर्वी शील,

प्रिस्टले आणि लव्हायेजेच्या अगोदर पोलिश किमयागार मायकल सँडिवोगसनं नत्र किंवा चिली सॉल्टपीटर ३३६ अंश तापमानाला तापवून त्यापासून 'नत्र हवा' म्हणजेच ऑक्सिजन मिळवला होता. 'माणूस पृथ्वीवर निर्माण झाला आणि इथल्या हवेवर तो जगतो,कारण त्या हवेत जगण्यासाठी अन्न अस्तित्वात आहे' असं त्यानं लिहून ठेवलं आहे.

सँडिवोगसला हवा ही वायूंचं मिश्रण आहे याचा अंदाज होता.रॉबर्ट बॉइलचा समकालीन असलेल्या जॉन मेयोनं दाखवून दिलं होतं,की नत्र हवा श्वासावाटे आत घेतल्यावर रक्ताला लाल रंग येतो.हीच नत्र हवा ज्वलनाला मदत करते आणि श्वसनावाटे प्राण्याच्या रक्तात जाते.'शुद्ध ऑक्सिजन थेरपी' म्हणून जास्त प्रमाणावर वापरण्याचा विचार सुचला तो थॉमस बेडोस याला. १७९८ साली त्यानं ब्रिस्टॉल येथे एक संस्थाच उभी केली आणि या कामासाठी हम्फ्रे डेव्हीला नियुक्त केलं. पण शुद्ध ऑक्सिजनचा व्यवस्थित पुरवठा न झाल्यानं बेडोसनं १८०२ मध्ये ही संस्था बंद केली. कमी प्रमाणातला ऑक्सिजन जसा धोकादायक असतो तसा जास्त प्रमाणातला ऑक्सिजन पण धोकादायक असतो.

हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन नियंत्रित प्रमाणात दिला जातो.लव्हायेजे निसर्गाला एक रासायनिक प्रयोगशाळाच म्हणत असे."या निसर्गाच्या प्रयोगशाळेत सतत नवीन पदार्थ तयार होतात आणि त्यांचे विघटनही होते" असं तो म्हणायचा.लव्हायेजे रसायनशास्त्राच्या प्रयोगात इतका बुडालेला असायचा की 'जीवन म्हणजे एक रासायनिक प्रक्रिया आहे' असं त्यानं लिहून ठेवलं होतं.ऑक्सिजनचा शोध लागताच आणखी काही रहस्यांचा उलगडा झाला.


पृथ्वीवरच्या वातावरणात सगळीकडे ऑक्सिजन आढळतो.

वातावरणात ऑक्सिजनची सातत्यानं निर्मिती होते,तसंच त्याचा सातत्यानं वापरही होत असतो.


त्यामुळे वातावरणातल्या ऑक्सिजन सजीवांकडे आणि तिथून पुन्हा वातावरणात असं चक्र चालूच असतं.ऑक्सिजन अतिशय क्रियाशील असून,इतर अनेक मूलद्रव्यांशी आणि संयुगांशी त्याचा संयोग होतो.ऑक्सिजन हा रेण्वीय ऑक्सिजन,पाणी,कार्बनडाय ऑक्साइड आणि असेंद्रिय संयुगे अशा स्वरूपात आढळतो.प्रकाशसंश्लेषण क्रियेत

ऑक्सिजनची निर्मिती होते तर श्वसन, ज्वलन, विघटन, गंजणे यांसारख्या क्रियांमध्ये ऑक्सिजन वापरला जातो. 


ज्वलनशील हवेचं ज्वलन होत असताना भांड्यात ओलावा निर्माण होत असल्याचं अनेकांनी नोंदवून ठेवलं होतं.याचा पद्धतशीर पाठपुरावा हेन्री कॅव्हेंडिशनं केला.आपल्या प्रयोगशाळेतल्या काचेच्या पोकळ नळ्या हायड्रोजन आणि चॉक्सिजन यांनी भरल्या.या मिश्रणातून त्यानं विद्युत ठिणगी धाडताच आतल्या बाजूला धुकं तयार होत असल्याचं आढळलं.सतत १० वर्ष कॅव्हेंडिशनं हे प्रयोग केले आणि काटेकोर मोजमाप करून तयार होणाऱ्या धुकं आणि हवेचं मोजमाप केलं.१७८४ साली रॉयल सोसायटीला कॅव्हेंडिशनं आपले निष्कर्ष धाडले.त्याचे निष्कर्ष असे होते दोन भाग हायड्रोजन (कॅव्हेंडिश त्याला फ्लॉजिस्टॉन म्हणायचा.) आणि एक भाग ऑक्सिजन (कॅव्हेंडिश त्याला फ्लॉजिस्टॉनविरहित हवा म्हणायचा.) यांचा संयोग घडून येताच त्यापासून पाणी तयार होते. १७८३ साली जेम्स वॉट यानंसुद्धा पाण्याचे घटक यावर आपला शोधनिबंध प्रकाशित केला.


स्थिर हवा आणि ज्वालाग्राही हवा कालांतरानं पृथ्वीच्या वातावरणात आढळली.पण पूर्वी हवेला अभिजात वायूचाच एक प्रकार समजण्यात यायचा. वातावरणातली हवा ही अनेक प्रकारच्या वायूंच्या मिश्रणातून बनली आहे हे कोणाच्या गावीही नव्हतं. प्राचीन काळापासून माणसाला सॉल्टपीटर आणि नायट्रिक आम्ल ही नायट्रोजनची संयुगं ठाऊक होती. त्यामधून पडणाऱ्या तपकिरी रंगाच्या वाफाही माणसाच्या नजरेस आल्या होत्या. पण त्यापासून नायट्रोजन वायुरूपात वेगळा करणं त्या वेळेला अर्थातच अशक्य होतं.साधारण १७७६च्या सुमारास हेन्री कॅव्हेंडिशनं आणि जोसेफ प्रिस्टलेनं निरनिराळ्या वायूंमध्ये विद्युत विमोचनाचे कोणते परिणाम घडून येतात ते तपासायला सुरुवात केली. त्याला हवेचे 'साधी हवा,ज्वालाग्राही हवा आणि स्थिर हवा' असे तीनच प्रकार माहीत होते.या प्रयोगातून निष्पन्न असं काहीच झालं नाही.पण दमट हवेतून वीज सोडली असता नायट्रिक आम्ल मिळतं असं त्याच्या लक्षात आलं. पुढे = १७७७ मध्ये 'मी हवेचा एक नवा प्रकार तयार केला असून तिला 'विषारी हवा' किंवा गुदमरवणारी हवा' असं नाव दिलं आहे' असं कॅव्हेंडिशनं प्रिस्टलेला खासगी पत्राद्वारे कळवलं. ही हवा तयार करण्यासाठी कॅव्हेंडिशनं नेहमीच्या हवेला तप्त कोळशावरून पुनःपुन्हा नेलं आणि मिळालेली स्थिर हवा अल्कली द्रव्यामार्फत पुन्हा शोषून घेतली.यातून उरणारा भाग म्हणजे 'गुदमरवणारी हवा,' कॅव्हेंडिशनं यावर अधिक संशोधन केलं नाही.जे सापडलं ते प्रिस्टलेला कळवून मोकळा झाला. 


प्रिस्टले त्याच सुमारास दुसऱ्या प्रयोगात गुंतल्याने त्यानं कॅव्हेंडिशचं पत्र फारसं गांभीर्यानं घेतलं नाही. प्रिस्टलेनं धातूंच्या सान्निध्यात अनेक ज्वालाग्राही पदार्थ जाळले.

त्यामध्ये जीस्थिर हवा मिळाली ती चुन्याच्या निवळीच्या साहाय्यानं वेगळी केली. 


प्रिस्टलेला असं आढळलं,की या साऱ्या प्रकारात हवेचे आकारमान घटते.पण प्रिस्टलेनं जे काही बघितलं ते स्पष्ट करण्यासाठी फ्लॉजिस्टॉन सिद्धान्ताचा आधार घेतला.

'धातूच्या भाजण्याच्या क्रियेत जे काही होते ते फ्लॉजिस्टॉनमुळेच होते' अशी प्रिस्टलेला खात्री होती.ही हवा उरते त्यात फक्त फ्लॉजिस्टॉनच उरतो म्हणून प्रिस्टले त्या हवेला 'फ्लॉजिस्टॉनयुक्त हवा' असं म्हणायचा. धातूच्या भाजण्याच्या क्रियेत उपकरणातला ऑक्सिजन धातूशी संयोग पावतो आणि नायट्रोजन उरतो हे आज आपण सांगू शकतो.पण प्रिस्टलेनं केवळ अज्ञानामुळे त्या हवेला फ्लॉजिस्टॉनयुक्त हवा म्हणे.आपल्याला नक्की काय सापडलं ते प्रिस्टलेला कळलंच नाही.पुढे जेव्हा ऑक्सिजन शोधला गेला तेव्हाच या नव्या वायूचं स्वरूप स्पष्ट झालं.


नायट्रोजनच्या शोधाचं श्रेय डॅनियल रुदरफोर्ड याला दिलं जातं.त्यानं कॅव्हेंडिश आणि प्रिस्टले यांनी केलेलेच प्रयोग परत करून बघितले. त्यानं निःसंदिग्धपणे नायट्रोजनचे गुणधर्म १७७२ च्या एका प्रबंधात सांगितले.हा वायू चुन्याच्या निवळीत किंवा अल्कलीमध्ये शोषला जात नाही. आणि तो श्वसन किंवा ज्वलनासाठीही उपयुक्त नाही. डॅनियल रुदरफोर्डनं या वायूला 'अशुद्ध हवा' असं नाव दिलं.या वायूला निश्चित असं नाव आणि चिन्ह लव्हायेजे आणि इतर शास्त्रज्ञांनी रासायनिक नावांची परिभाषा तयार केली तेव्हा दिलं. 'नायट्रोजेनिअम' या लॅटिन शब्दावरून सॉल्टपीटर तयार करणारे या अर्थी 'नायट्रोजन' हे नाव या वायूला दिलं.


डॅनियल रुदरफोर्डचा १७४९ साली एडिनबर्गमध्ये जन्म झाला.त्याचे वडील जॉन रुदरफोर्ड एडिनबर्ग विद्यापीठात वैद्यकशास्त्राचे प्राध्यापक होते. डॅनियल रुदरफोर्डही एडिनबर्ग विद्यापीठात वैद्यकशास्त्र शिकला.पण त्याला सर्वात जास्त रस होता ते रसायनशास्त्रात आणि वनस्पती विज्ञानात ! १७८६ साली एडिनबर्ग विद्यापीठातच त्याची वनस्पती विज्ञानाचा प्राध्यापक म्हणून नेमणूक झाली.त्याच साली रॉयल बॉटनिक गार्डनचा प्राध्यापक जॉन होपच्या निधनानंतर त्याच्या जागी डॅनियल रुदरफोर्डची नेमणूक झाली. ही दोन्ही पदं डॅनियल रुदरफोर्डनं आपल्या मृत्यूपर्यंत म्हणजे १८१९ पर्यंत भूषवली.डॅनियल रुदरफोर्डला रसायनशास्त्रात रस उत्पन्न झाला तो त्याचा शिक्षक जोसेफ ब्लॅकमुळे ! त्यावेळी जोसेफ ब्लॅकचे प्रयोग चालले होते ते हवेच्या गुणधर्माबाबत ! एका काचेच्या बरणीत मेणबत्ती पेटवली की ती थोड्या वेळानं विझत असल्याचं त्याला आढळलं.एरवी मेणबत्ती पेटवल्यावर त्यातलं मेण जळत राहतं.मेण संपूर्ण जळून संपून गेल्यानंतरच मेणबत्ती विझते. पण या बरणीत मेणबत्ती मेण संपल्यानं विझत नव्हती तर ती मध्येच विझत होती.आता आपल्याला ही अतिशय साधी गोष्ट वाटते. पण शास्त्रज्ञांना कुठलीही घटना साधी वाटत नाही. हे असं का होतं? या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी त्यानं मेणबत्ती जळल्यानंतर तयार होणारा धूर किवा वायू काळजीपूर्वक बाहेरची हवा आत न येऊ देता एका द्रवात मिसळला.पण तरीसुद्धा काचेच्या बरणीत ठेवलेली मेणबत्ती पेटत नसल्याचं त्याच्या लक्षात आलं,साहजिकच आता काचेच्या बरणीत मेणबत्ती जळल्यानंतर तयार होणारा घर किंवा वायू नाही हे आता स्पष्ट होत होतं.कारण जोसेफ ब्लॅकनं तो घर किंवा वायू या आधीच एका द्रवात विरघळून काढून टाकला होता.बरणीच्या हवेत अजून एक घटक आहे जो ज्वलनाला मदत करीत नाही असं जोसेफ ब्लॅकच्या लक्षात आलं.मग त्यानं हा प्रश्न डॅनियल रुदरफोर्डला सोडवायला सांगितला.


डॅनियल रुदरफोर्डनं एका बरणीत उंदराला कोंडून ठेवलं आणि बरणीत बाहेरून हवा जाणार नाही अशा पद्धतीनं घट्ट बंद केली.त्या बरणीत त्यानं एक मेणबत्ती आणि फॉस्फरस ते विझेपर्यंत जाळले. बरणीतली हवा काळजीपूर्वक त्यानं एका आम्लारी धर्मी द्रवातून जाऊ दिली.त्याचा उद्देश हा होता, की मेणबत्तीच्या ज्वलनामुळे तयार होणारी हवा शोषून घेतली जाईल.आता बरणीत उरलेल्या हवेत मेणबत्ती विझते आणि उंदीरही मरतो असं डॅनियल रुदरफोर्डच्या लक्षात आलं.

अर्थात,ही उरलेली हवा ज्वलनाला मदत करत नाही आणि त्यात प्राणीही जगू शकत नाहीत.१७७२ साली डॅनियल रुदरफोर्ड आणि ब्लॅकनं आपले निष्कर्ष प्रसिद्ध केले.पण याचं स्पष्टीकरण त्यांनी फ्लॉजिस्टॉन सिद्धान्ताच्या आधारे देण्याचा प्रयत्न केला.उंदराचे श्वसन आणि मेणबत्ती तसंच फॉस्फरसचं जळणं यामुळे जी हवा निर्माण झाली तिलाच 'बद्ध हवा' असं नाव दिलं गेलं.याबरोबरच त्यातून फ्लॉजिस्टॉन बाहेर पडला असं रुदरफोर्डनं म्हटलं.

रुदरफोर्डच्या म्हणण्यानुसार बरणीत आता फक्त फ्लॉजिस्टॉन शिल्लक राहिला आहे. रुदरफोर्डनं या हवेला 'बद्ध हवा' तर प्रिस्टलेनं याला 'फ्लॉजिस्टॉनमय' हवा असं नाव दिलं.शील आणि कॅव्हेंडिश दोघंही याच हवेचा अभ्यास करत होते. १७८९ साली लव्हायेजेनं या वायूला 'अझोट' असं नाव सुचवलं.ग्रीकमध्ये अझुटोस म्हणजे 'जीवनविरहित.' या वायूच्या सान्निध्यात प्राणी जगत नाहीत.तो नायटर या पदार्थाचा एक भाग आहे.नायटर म्हणजे 'सॉल्टपीटर.'त्याचं रासायनिक नाव पोटॅशियम नायट्रेट.पोटॅशियम नायट्रेट हे 'गन पावडर'मध्ये वापरतात.फ्रेंच रसायनशास्त्रज्ञ जीन अँटोनी चॅप्टल (१७५६-१८३२) यानं त्याच्या आपल्या १७९० साली प्रकाशित झालेल्या पुस्तकात या वायूचा सर्वप्रथम 'नायट्रोजन' असा उल्लेख केला. हा शब्द त्यानं ग्रीकमधल्या 'नायट्रॉन' किवा 'नायटर' या शब्दावरून घेतला.नायटोजन हे ग्रीक शब्दाचं इंग्रजीतलं रूप.या नायट्रोजनचं वातावरणातलं एक चक्र आहे.इतर अनेक मूलद्रव्यांच्या तुलनेत नायट्रोजन निष्क्रिय आहे आणि तो सहजासहजी इतर मूलद्रव्यांबरोबर संयोग करत नाही. 


बहतेक सजीवांना मुक्त स्थितीतला नायट्रोजन वापरता येत नाही.नायट्रोजनचं रूपांतर वातावरणीय,औद्योगिक तसंच जैविक प्रक्रियेद्वारे नायटेट आणि नायट्राइट या संयुगात होतं. सजीवांनी वापरलेला नायट्रोजन सजीव मृत झाल्यावर त्याचे अवशेष,उत्सर्जित पदार्थ यांचं विघटन होऊन त्यातून अमोनिया मुक्त होतो. थोडक्यात,वातावरणातल्या मुक्त नायट्रोजनचं सजीवांत उपयुक्त अशा नायट्रोजन संयुगात आणि सजीव मृत झाल्यावर पुन्हा नायट्रोजन वायूत रूपांतर होतं.हे चक्र अखंड चालू असतं,१८०७ मध्ये थॉमस यंग (Thomas Young) (१७७३ ते १८२९) यानं ज्या ज्या गोष्टींतून काहीतरी कार्य होऊ शकतं त्या त्या गोष्टी ऊर्जा वापरतात हे सांगून ऊर्जा (एनर्जी) हा शब्द पहिल्यांदाच वापरला.खरं तर एनर्जी हा शब्द ग्रीक 'काम करणं' या अर्थाच्या शब्दावरून आलेला आहे.


एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या भौतिकशास्त्रामध्ये ऊर्जा एका रूपातून दुसऱ्या रूपात कशी रूपांतरित करता येते किंवा होते याचा बराच अभ्यास झाला. १८४० च्या दरम्यान ब्रिटनचा जेम्स ज्यूल आणि जर्मनीचे ज्यूलियस मेयर आणि हर्मन हेल्महोल्टझ हे किमान तिघे वैज्ञानिक ऊर्जा अक्षय्यतेच्या संकल्पनेपर्यंत आले होते. या संकल्पनेनुसार कोणतीही ऊर्जा दुसऱ्या कोणत्याही ऊर्जेत रूपांतरित करता येते, पण एकूण ऊर्जा कायम तितकीच राहते. कोणत्याही प्रक्रियेत एकूण ऊर्जा कधीही कमी किंवा जास्त होत नाही.


सजीव प्राणी सतत आपल्या अन्नातून ऊर्जा मिळवत असतात,पण वनस्पती मात्र फक्त पाणीच घेतात.पण फक्त पाण्यापासून वनस्पती आपली पानं,फुलं,फळं निर्माण करू शकत नाहीत. थोडक्यात,प्राणी आणि वनस्पती यांच्या फिजिओलॉजीज वेगळ्या असतात असं वाटत होतं.वनस्पती प्राण्यांसारखा श्वासोच्छ्वास करत नाहीत.पण प्रकाश असल्याशिवाय त्या वाढूही शकत नाहीत असं लक्षात आलं होतं.खरं तर पृथ्वीवरच्या ऊर्जेचा स्रोत हा सूर्यापासून येणारा प्रकाश आणि उष्णता हा आहे हे मेयरनं सांगितलं होतं आणि हीच ऊर्जा कोणत्या तरी स्वरूपात सगळ्या सजीवांमध्ये संक्रमित होत असावी असंही मेयरला वाटत होतं.म्हणजेच सूर्यापासून ऊर्जा वनस्पतींमध्ये येते आणि वनस्पतींमधून प्राण्यांमध्ये येते.याचाच अर्थ ऊर्जा अक्षय्यतेचा नियम सजीव आणि निर्जीव अशा सगळ्याच गोष्टींना लागू होतो,हे आता लक्षात आलं होतं. ...( समाप्त )

१/१२/२५

अक्षय्यतेचा नियम / Law of Inexhaustibility

फ्रेंच वैज्ञानिक अँटोनी लॉरेंट लव्हायेजे (Antoine Laurent Lavoisier) (१७४३ ते १७९४) हा अठराव्या शतकातला सगळ्यात महान केमिस्ट होता.त्यानं रसायनशास्त्रात अचूक मोजमापांचं महत्त्व लक्षात घेऊन कम्बशनची (ज्वलन) थिअरी निर्माण केली.विशेष म्हणजे ही थिअरी तेव्हापासून आजतागायत तशीच स्वीकारली गेली आहे.या थिअरीत कम्बशन हे ऑक्सिजनच्या सान्निध्यात होणारं रासायनिक ज्वलनच आहे हे त्यानं सांगितलं होतं.शिवाय त्यानं हवेत ऑक्सिजनशिवाय नायट्रोजनही असतो,तो ज्वलनाला मदत करत नाही हेही दाखवलं.लव्हायेजेची ही थिअरी सजीवांनाही लागू होत होती.जी गोष्ट ज्वलनाला लागू होते तीच गोष्ट उंदरालाही लागू पडते.बंद बरणीत एक मेणबत्ती जाळली तर त्यातला ऑक्सिजन वापरला जातो आणि कार्बन डाय ऑक्साइड तयार होते.कार्बन डाय ऑक्साइड हा त्या मेणबत्तीतल्याच पदार्थांपासून तयार होतो.


तसंच सजीवांच्या बाबतीतही हे लागू पडतं.बंद बरणीतला उंदीरही जिवंत असेपर्यंत ऑक्सिजन वापरतो आणि कार्बन डाय ऑक्साइड बाहेर टाकतो.उंदराच्या शरीराला लागणारा ऑक्सिजन संपत जातो आणि त्याच्या शरीरात तयार होणारा कार्बन डाय ऑक्साइड बरणीत जमा होतो.तर वनस्पतींच्या दृष्टीनं पाहिलं तर त्या कार्बन डाय ऑक्साइड घेतात आणि ऑक्सिजन सोडतात. म्हणजेच वनस्पती आणि प्राणी एकमेकांना पूरक आहेत.हे दोघंही मिळून वातावरणातल्या वायूंचा समतोल कायम सांभाळतात.यामुळेच वातावरणातला ऑक्सिजन कायम २१% राहतो आणि कार्बन डाय ऑक्साइड ०.०३% राहतो.


मेणबत्ती आणि उंदीर हे दोघंही ऑक्सिजन वापरतात आणि कार्बन डाय ऑक्साइड हवेत सोडतात हे बघून लव्हायेजेला माणसाच्या श्वसनाची तुलना कम्बशनशी (ज्वलन) करावीशी वाटली.सजीवाच्या शरीरात होणारं श्वसन आणि बाहेर होणारं ज्वलन यांची तुलना करावीशी वाटणं आणि त्यात साधर्म्य दिसणं ही खरंच विचारांची फार मोठी झेप होती.त्याला असं वाटलं की सजीव प्राणी ज्या प्रमाणात ऑक्सिजन वापरतो त्या प्रमाणात उष्णताही निर्माण करत असावा.हे सिद्ध करण्यासाठी त्यानं प्रयोगही सुरू केले.यातूनच पुन्हा एकदा सजीव आणि निर्जीव या दोन्ही गोष्टींना निसर्गाचे सारखेच नियम लागू होत असावेत का हा मुद्दा ऐरणीवर आला.


एकोणिसाव्या शतकाच्या मध्यात भौतिकशास्त्राचीही प्रगती झाली.त्यामुळेही लव्हायेजेच्या विचारांना पाठिंबा मिळाला.या दरम्यान अनेकांनी उष्णता या भौतिक परिमाणाचा अभ्यास करायला सुरुवात केली होती.त्यातून वाफेच्या इंजिनाचं महत्त्व वाढलं.त्यातून उष्णतेचा उपयोग करून गाडी चालवणं,गती,प्रकाश, इलेक्ट्रिसिटी,चुंबकत्व या भौतिकशास्त्रातल्या अनेक संकल्पना अभ्यासल्या जायला लागल्या.लव्हायेजेनं आपल्या पूर्वीची पिढी आणि समकालीन शास्त्रीय माहिती एकत्र करून बरोबर अर्थ लावला आणि नवीन पारिभाषिक शब्द तयार केले आणि वर्गीकरण करून माहितीला शास्त्रीय रूप दिलं.लव्हायेजेनं रसायनशास्त्रात खूप मोलाची भर घातली आणि म्हणूनच त्याला 'आधुनिक रसायनशास्त्राचा जनक' म्हणतात.


रासायनिक अभिक्रियांमधलं द्रव्याच्या अक्षय्यतेचं तत्त्व सूत्रबद्ध केलं,मूलद्रव्य आणि संयुगं यातला फरक स्पष्ट केला,रासायनिक संज्ञा देण्याची आधुनिक पद्धत शोधून काढली आणि रासायनिक संशोधनामध्ये परिमाणात्मक पद्धतीचा वापर करायला लव्हायेजेनं प्रथम सुरुवात केली.


अँटोनी लव्हायेजे हा २६ ऑगस्ट १७४३ ला पॅरिसमधल्या एका श्रीमंत घराण्यात जन्मला. लव्हायेजे त्याचा घराण्यातला एकुलता एक मुलगा. त्याचे वडील एक श्रीमंत जमीनदार आणि व्यापारी होते.आपल्या मुलानं कायद्याचा अभ्यास करून मोठेपणी एक निष्णात कायदेपंडित व्हावं अशी त्याच्या वडिलांची इच्छा होती.त्यानुसार लव्हायेजेनं आपलं कायद्याचं शिक्षण पॅरिसमधील मॅझेरीन या कॉलेजातून घेऊन वकिलीची सनदही मिळवली. कायद्याची पदवी घेतल्यानंतर लव्हायेजेला त्या वेळच्या उत्तम वकिलांच्या गटात सहजच प्रवेश मिळाला.मात्र लव्हायेजेचा खरा कल कायद्यापेक्षा विज्ञानाकडेच अधिक होता.कॉलेजात असताना लव्हायेजे रसायनशाखेचे प्राध्यापक बोरादेलिया यांची व्याख्यानं ऐकण्यासाठी नियमित जायचा.या व्याख्यानांच्या वेळी जी प्रात्यक्षिकं होत व्हायची ती लव्हायेजेला भारी आवडायची.

यातूनच लव्हायेजेनं भावी आयुष्यात वैज्ञानिक होण्याचं ठरवून टाकलं. पण वकील म्हणून प्रत्यक्ष काम करण्यापेक्षा लव्हायेजेनं पॅरिसमधल्या प्रतिष्ठित विज्ञान अकादमीत विज्ञानाचा अधिक अभ्यास करण्यासाठी १६६८ साली प्रवेश घेतला.त्यानं घरीच प्रयोगशाळा स्थापन करून त्यात अनेक शास्त्रीय उपकरणं ठेवली.


या प्रयोगशाळेचा फायदा घेण्यास सर्व शास्त्रषज्ञास त्यानं मोकळीक दिल्यानं त्यालाही अनेक मोठ्या शास्त्रज्ञांच्या परिचयाचा लाभ झाला.१७६८ मध्ये 'फ्रेंच अ‍ॅकॅडमी ऑफ सायन्सेस' या संस्थेत लव्हायेजेची 'सह'रसायनशास्त्रज्ञ म्हणून नेमणूक झाली.१७८५ मध्ये लव्हायेजे या संस्थेचा संचालक आणि १७९१ मध्ये कोषपाल झाला.लव्हायेजेला १७६८च्या सुमारास त्याच्या आईच्या इस्टेटीतून काही वाटा मिळाला.हा पैसा लव्हायेजेनं भागीदारीत व्यवसाय सुरू करण्यासाठी वापरला.त्यानं 'जनरल फार्म' नावाची आर्थिक व्यवहार बघणारी कंपनी काढली. त्याचं मुख्य काम म्हणजे शेतकऱ्याकडून मीठ आणि तंबाखू यांसारख्या पदार्थांवर कर गोळा करून तो सरकार दरबारी जमा करणे.


इ.स.१७७४ मध्ये लव्हायेजे आणि जोसेफ प्रिस्टले (१७३३-१८०४) यांची पॅरिसमध्ये भेट झाली. ऑक्टोबर १७७४ मध्ये प्रिस्टलेनं आपल्या संशोधनाबद्दल लव्हायेजेला कळवलं.त्या वेळेस प्रिस्टलेनं पाऱ्याचं लाल भस्म तापवल्यानंतर खलनक्रियेला अधिक मदत करणारी हवा तयार होते आणि ती श्वसनासाठी सामान्य हवेपेक्षा पाच ते सहापट जड असते असं सांगितलं.प्रिस्टलेनं तिला 'डिफ्लॉजिस्टिकेटेड हवा (ज्वलन तत्त्व-विरहित हवा)' असं नाव दिलं.लव्हायेजेनं ताबडतोब रेड मर्क्युरिक ऑक्साइडवर प्रयोग सुरू केले.१७७५च्या एप्रिलमध्ये 'अ‍ॅकॅडमी ऑफ सायन्स'ला लव्हायेजेनं आपले निष्कर्ष कळवले.लव्हायेजेनं काटेकोरपणे प्रयोग केल्यानंतर ज्वलनक्रियेमध्ये आणि धातूंच्या भस्मीकरणामध्ये सामान्य हवेच्या दिलेल्या घनफळामधल्या फक्त काही भागाचाच वापर झाला आणि ती प्रिस्टलेनं शोधलेली नवीन हवा असल्याचं अनुमान काढलं.'साऱ्या पदार्थांचं वजन ज्वलनाअंती वाढतं' असा निष्कर्ष त्यानं काढला. या अभिक्रियांमध्ये हवा भरपूर प्रमाणात लागते हे पाहून लव्हायेजेनं 'हवा ही वेगवेगळ्या वायूंचे मिश्रण असून हे वायू निरनिराळ्या गुणधर्माचे असतात.त्यापैकी काही भाग ज्वलनास उपयुक्त असून तो जळणाऱ्या पदार्थाशी संयोग पावतो आणि 'हवा ज्वलनाला उपयुक्त असते ती श्वसनक्रियेशी फारच अनुकूल असते' असे निष्कर्ष काढले.(सजीव,अमृता देशपांडे,अच्युत गोडबोले,मधुश्री पब्लिकेशन) १७७७ साली प्रसिद्ध केलेल्या 'मेणबत्तीचं हवेतलं ज्वलन' या आपल्या शोधनिबंधात लव्हायेजेनं चार प्रकारच्या हवेचा उल्लेख केला होता.हवेचा पहिला प्रकार म्हणजे वातावरणातली हवा ज्यात आपण राहतो आणि जी श्वासावाटे घेतो ती हवा.प्रिस्टलेनं नामकरण केलेली 'डिफ्लॉजिस्टिकेटेड हवा (ज्वलन तत्त्व-विरहित हवा)' म्हणजेच वातावरणातल्या हवेच्या एकचतुर्थांश श्वसनासाठी उपयुक्त असलेली शुद्ध हवा हा हवेचा दुसरा प्रकार.

रुदरफोर्डनं उल्लेख केलेली,पण त्यावेळी या हवेचे अन्य गुणधर्म माहीत नसलेली 'अझोट हवा' हा तिसरा प्रकार.


(उर्वरित शिल्लक भाग पुढील लेखामध्ये)