* विजय गायकवाड | Vijay Gaikawad: छत्रपती शिवाजी महाराजांचं जग / The world of Chhatrapati Shivaji Maharaj

live

नमस्कार आपले स्वागत आहे. मी पुस्तके आणि मित्रांवर पैसे खर्च करतो,माझ्याकडे दगड आणि विटांवर खर्च करण्यासाठी पैसे नाहीत.- रस्किन बाँड.ही थोर माणसं व त्यांचे विचार मला पुस्तकात भेटलीत.ती भेटली आणि त्यांनी सांगितले कि, प्रत्येक दिवशी असं काही तरी करा की,ते तुम्हाला अधिक सुंदर उद्याच्या दिशेने खूप लांबवर घेऊन जाईल."- डोग फायरबाऊ.' सर्वियन कादंबरीकार मिलोराद पावीच यांचे एक वाक्य आहे ते म्हणतात - जोवर जगात पुस्तक वाचणाऱ्या वाचकांची संख्या बंदूकधारी सैनिका पेक्षा अधिक आहे तोवर काळजीच काहीच कारण नाही.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात.पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये.म्हणून अविरतपणे प्रयत्न करणारे मार्गदर्शक, मित्र धावून येतात.प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,डॉ.दीपक शेटे,आ.भरत बुटाले,प्रा.सर्जेराव राऊत,सुभाष ढगे,अनिल फारणे,डॉ.सुधीर सरवदे ,विश्वास खाडे, विनायक पाटील,संजय कुंभार,सतीश खाडे,मनोहर सुर्वे,गणेश खंदारे,तात्या गाडेकर, दादासाहेब गाडेकर, दादासाहेब ताजणे, पुस्तकातील घटना प्रसंग सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील यांनी केलेले आहे. मला लिहिण्याची प्रेरणा देणारी पुस्तके,लेखक,प्रकाशक,मित्र ही जगावेगळी माणसं माझ्या जीवनातील महत्वाचा टप्पा आहेत.... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ.मेघा गायकवाड, चिरंजीव मयान,माझ्या धावण्यातील गुरुवर्य नामदेव बरुरे,लुल्ला शेख मोठी ताई ,लहान ताई जयश्री शिंदे या सर्वांचेच मनापासून आभार व धन्यवाद मॅट्रिक फेल विजय गायकवाड

5/15/26

छत्रपती शिवाजी महाराजांचं जग / The world of Chhatrapati Shivaji Maharaj

सन १६३० मध्ये मराठा सरदारकुळातल्या जिजाबाईंनी दुसऱ्या पुत्राला जन्म दिला,तेव्हा हा मुलगा सामर्थ्यशाली मोगल साम्राज्याच्या सामर्थ्याचे तुकडेतुकडे करील अशी कल्पनाही त्यांच्या मनाला शिवली नव्हती.(त्यांच्या पहिल्या पुत्राचं जन्मतःनिधन झालं होतं.)

ज्या प्रदेशात बालशिवाजीचं आगमन झालं होतं,तो दख्खन प्रदेश आधीपासूनच फार आकर्षक प्रदेश होता. त्याच्या जन्म होण्याच्या चार वर्ष अगोदर या दख्खन प्रदेशाचा नायक होता एक मुस्लीम योद्धा आणि त्याचं नाव होतं 'मलिक अंबर'.त्याची कारकीर्दच मुळी आफ्रिकेतल्या गुलामगिरीत सुरू झाली आणि भारतात सत्ता-वैभवाच्या कळसास पोहोचली.

गणिका,महात्मा,आणि एक इटालियन ब्राह्मण,भारतीय इतिहासातील अज्ञात कहाण्या,एस.पिल्लई,अनुवाद-सविता दामले 

तत्कालीन अहमदनगरचा सुलतान होता निजामशाह. त्याचे पूर्वज ब्राह्मण होते.परंतु त्याच्या वंशात आफ्रिकन आणि पर्शियन (इराणी) स्त्रियांचे पत्नी या नात्याने स्वागत होत होते.शिवाजी महाराजांचे पित्याच्या घराण्यातील आजोबा मालोजीराजे भोसले यांचे मलिक अंबरशी आणि निजामशाही घराण्याशी जवळचे संबंध होते,तर त्यांच्या आजोळच्या घराण्याचे लोक आपली सेवा आग्याच्या मुघल बादशाहीच्या चरणी रुजू करत होते. त्या काळात संपूर्ण क्षितिजावर जणू न संपणारे लष्करी नाट्यच चालल्यासारखे भासत होते.शिवाजी महाराज बालवयातच असताना निजामशाहाचा शेवटचा वंशज मोगलांच्या किल्ल्यावर बंदिस्त झाला आणि त्याच्या वाडवडिलार्जित राज्याचे तुकडे सम्राट शाहजहान आणि त्याच्या फौजेने गिळंकृत केले.

त्याही आधी दख्खन प्रदेशात मोठ्या मोठ्या हिंदू राजघराण्यांची सत्ता होती.परंतु चौदाव्या शतकात अल्लाउद्दीन खिलजीसमोर त्यांचे काहीच चालले नाही. त्यातून पुढे बहामनी सल्तनतीची स्थापना झाली.या सुरुवातीच्या लष्करी संघर्षात मोठ्या प्रमाणात सांस्कृतिक विध्वंस झाला.परंतु लवकरच नवे राजे प्रस्थापित झाले आणि जुन्या राज्यातील प्रजेशी त्यांनी जुळवून घेतलं.बहामनी आणि महाराष्ट्रातल्या निजामशाहांसकट त्यांच्या वंशजांनी दख्खनला आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या इस्लामी जाळ्याशी जोडलं. त्यातूनच या प्रदेशात फारसी दरबारी संस्कृती उदयास आली.त्याच वेळेस या नवागतांनी मराठा स्त्रियांशी विवाह केले,मराठी भाषेला आश्रय दिला.स्थानिक रूढी आणि प्रथांवरच त्यांचे संगोपन झाले.तसं त्यांना करावंच लागलं कारण प्रचंड विस्तृत आणि दुर्गम अशा ग्रामीण भागांवर वर्चस्व गाजवणाऱ्यांच्या स्थानिक अभिजनांच्या सहकार्याशिवाय त्यांना राज्यकारभार करणं अशक्य होतं.त्यामुळेच शाहणपणाने त्यांनी या भूमीवरील जुन्या सरदारांशी हातमिळवणी केली आणि त्या दोघांनी मिळून काहीतरी नवंच जन्माला घातलं.कित्येक शतके या नव्या संस्कृतीचं वैभव कायम होतं.परंतु औरंगजेब नामक उत्तरेकडील नव्या बादशाहच्या महत्त्वाकांक्षांनी त्याचं रूपांतर आणखी एका शोकात्म अध्यायात केलं.

मुस्लीम सत्तेच्या या कालखंडात मराठ्यांनीही त्यांची अस्मिता विकसित केली होती आणि भारतीय इस्लामिक परंपरेतील सर्वोत्तम ते स्वीकारलं होतं.शिवाजी महाराजांचे पिता शाहजी आणि काका शरीफजी या दोघांची नावं 'शाह शरीफ' या मुस्लीम संताच्या नावावरून ठेवली आहेत.वेरूळला भोसले घराण्याचं मूळ स्थान आहे. तिथे शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजी राजे आणि अन्य नातेवाइकांच्या समाध्या आहेत.त्यांचं बांधकाम इस्लामी मकबऱ्यासारखे दिसत असल्याने ते निजामशाहा आणि तत्कालीन महानायक मलिक अंबर यांचेच मकबरे आहेत की काय,अशीच चुकीची समजूत सुरुवातीला झाली होती.मलिक अंबरने ज्या शहराची स्थापना केली (त्याचेच नामकरण नंतर 'औरंगाबाद' असं झालं.) 

त्या शहरातील कित्येक मोहल्ल्यांना त्यानं त्याच्या एकनिष्ठ मराठा सरदारांची नावं दिली होती.पोशाख, स्वयंपाक आणि भाषा यांवरही या सुलतानांनी आपली छाप सोडली आहे आणि कित्येक मराठा घराण्यांनी या मुस्लीम मालकांच्या सेवेत आपलं वैभवशाली आयुष्य दिलं आहे ते दिसून येतं.त्या सर्वांनी एकत्रित येऊन इतिहास निर्माण केला.१५६५ साली तालिकोटा येथील प्रसिद्ध लढाईत दख्खनच्या सुलतानांनी विजयनगरच्या राज्याचा पराभव केला,तेव्हा मुस्लीम शाहजाद्यांसाठी हजारो मराठा योद्धेच लढले होते.धर्माच्या विषयातही त्या काळात वादविवाद आणि चर्चा चालत होत्या.भक्तिमार्गी संत तुकाराम यांचे समकालीन मुंतोजी म्हणून होते.ते बहामनी घराण्यातील सर्वांत धाकटे वंशज होते.त्यांनी बिस्मिल्ला म्हणणे आणि रामाची आळवणी करणे हे 'समान'च आहे असे म्हटले. तर संत एकनाथांनी त्यांच्या भारुडात केवळ ब्राह्मण आणि महारच नव्हे;तर मुस्लीम आणि आफ्रिकनांनाही (हबश्यांनाही) जागा दिली.परंतु शिवाजी महाराजांनी सत्ता आणि तिचा आविष्कार यांच्याकडे वेगळ्या नजरेने पाहिलं.सुलतानाने त्यांच्या पित्याला पुष्कळ पदव्या दिल्या होत्या -'अल दार अलजुरत वालेझामा' ('निर्भीडता आणि भव्यतेचे आश्रयस्थान') किंवा 'उम्द अल्दौलत अलेझिमा' ('पराक्रमी राज्याचा आधारस्तंभ') किंवा अगदी 'अब्नी' ('माझा पुत्र') अशा त्या पदव्या असल्या,तरी जेव्हा प्रादेशिक मुस्लीम सत्तेचा ऱ्हास होऊ लागला तेव्हा त्यात पूर्णतया नवीन स्वराज्य स्थापनेची संधी आहे हे केवळ शिवाजी महाराजांना दिसलं. 

त्या काळातल्या बऱ्याच मराठा घराण्यांना त्यात दोन पर्याय दिसले एक म्हणजे प्रादेशिक मुस्लीम सत्तेची पाठराखण करायची किंवा मुघल सत्तेची मालकी स्वीकारायची.परंतु शिवाजी महाराजांनी काहीतरी पूर्ण वेगळ्याच गोष्टीची इच्छा धरली.त्यांना असं नवं राज्य हवं होतं,ज्यात फारसी आणि इस्लामी प्रभाव जाणीवपूर्वक टाळले जातील,त्याऐवजी 'महाराष्ट्र धर्माची' स्थापना होईल.शिवाजी महाराजांनी या स्वराज्य मोहिमेत सामील होण्याची केलेली विनंती एका मोठ्या मराठा सरदाराने धुडकावून लावली आणि सांगितलं की, माझी निष्ठा मी मुस्लीम सरदाराच्या पायाशी वाहिलेली आहे.तेव्हा शिवाजी महाराजांनी त्याला आठवण करून दिली,की माझी मोहीमही बेइमानीची नाही तर ती उलट अधिक वरच्या अधिकारी स्थानाच्या चरणांशी म्हणजेच स्थानिक देवतेच्या चरणी वाहिलेली आहे.त्या देवतेच्या नावानेच 'हिंदवी स्वराज्य' आपण निर्माण केले पाहिजे. आता त्यांना फारसी बादशाहंचं श्रेष्ठत्व स्वीकारण्यात जराही रस नव्हता म्हणजे स्वतःलाच मराठा बादशाह बनण्याची आणि स्वतःचं राज्य स्थापन करण्याची शक्यता असताना तर तसं मुळीच करायचं नव्हतं.

अर्थात,असे बरेच लोक होते,ज्यांना आपली ताकद महाराजांच्या या मोहिमेस पाठिंबा देण्यात वाया घालवायची नव्हती.परंतु महाराज त्यांच्याकडे 'वाट चुकलेले' लोक म्हणून किंवा फारच झालं तर 'साप' म्हणून पाहायचे.या लोकांना एक तर आपण गोडीगुलाबीने किंवा (ते नाहीच जमलं, तर ताकद दाखवून) आपल्या बाजूला वळवू शकतो, असं त्यांना वाटत होतं.परंतु एक गोष्ट इथं स्पष्ट केलीच पाहिजे,ती म्हणजे शिवाजी महाराजांच्या या अभियानाला कुठल्याही प्रकारे 'जातीयवादी' लेबल लावता आलं नसतं.म्हणजे, अचानक लोक एके दिवशी मोठ्या संख्येने जागृत झाले की,आपण हिंदू आहोत आणि त्यांनी हाती शस्त्रं घेऊन 'मुस्लीम' या नावाने ओळखली जाणारी जमात नष्ट करून टाकली असं काही त्यात नव्हतं आणि झालंही नाही.तर या भूमीवरील राजकारणी अभिजनांत एका नव्या सिद्धांताचं त्यांनी रोपण केलं.

म्हणजे एकीकडे शिवाजी महाराजांनी मुस्लीमांना नोकरीवर ठेवलं,न्यायदानासाठी काझींना नेमलं,तरी तसं करताना संस्कृत परंपरेत रुजलेल्या नव्या राजकीय अभिव्यक्तीचा त्यांनी सक्रिय मागोवा घेतला. जनुकशास्त्रीय दाव्यांनी त्यांना उत्तरेकडील राजपुतांशी जोडलेलं होतं आणि जीवनाच्या अखेरीस त्यांनी लिहिलेली पत्रं फारसी या तत्कालीन दरबारी भाषेऐवजी संस्कृतात होती. त्यांनी 'राज्यव्यवहारकोश' हा शब्दकोश बनवण्याचा आदेशही दिला होता.त्यात असे म्हटले आहे की, अतिमहत्त्व दिलेल्या यावनी (परदेशी) शब्दांच्या जागी आता सुशिक्षित शब्दप्रयोग येतील.त्यांना व्यक्तिशः मुसलमानांबद्दल कसलाही आकस नसला,तरी त्यांनी इस्लामी आदर्शावर उभारलेल्या जुन्या व्यवस्था फेकून दिल्या आणि भारतीय उच्च परंपरांकडून प्रेरणा घेतलेली नवीन व्यवस्था शोधली.गोवळकोंड्याच्या कुतुबशाहशी (त्याचे मंत्री ब्राह्मण होते) त्यांनी दोस्ती केली,तर वेगवेगळ्या सुलतानांना निष्ठा वाहाणाऱ्या हिंदू मराठ्यांना त्यांनी आव्हान दिलं.एकदा तर त्यांच्या स्वतःवरच मोगल दरबारात सामील होण्याचा प्रसंग ओढवला,तेव्हा शिवाजी महाराज स्वतःची एक वेगळी प्रतिमा निर्माण करण्याच्या प्रयत्नांत होते.सभासद बखरीत तिचा उल्लेख 'नवी पद्धती' असा केला आहे.परंतु या राष्ट्रवादाची व्याख्या कुठल्याही प्रकारे जातीयवादी आधारावर होऊ शकत नव्हती.ती सरंजामशाही व्यवस्थाच होती.फक्त ती हिंदू मुळांतून आलेली सरंजामी व्यवस्था होती.अर्थात या स्वराज्य मोहिमेत बरेच विरोधाभास आढळून येतात.हल्लीच्या विविध अस्मिता आणि दुफळी पडलेल्या राजकीय अधिकाराच्या काळात आपण जी तत्कालीन 'स्व-प्रतिमा' पाहतो तिच्यातून त्या काळातील प्रत्यक्ष जमिनीवर जगलेले वास्तव प्रतिबिंबित होत नाही,हे तर साहजिकच आहे.म्हणजे अगदी मोगलही बरेचदा धर्माच्या नावाने 'आम्ही फार श्रेष्ठ आहोत,'असे शब्दप्रयोग करताना दिसून आले,

तरी प्रत्यक्ष व्यवहारात त्यांनाही हिंदू सरदारांशी आणि उच्च अभिजनांशी सहकार्य करावं लागत होतंच.परंतु शब्दबंबाळ इतिहास लेखनाच्या आड हे जमिनीवरील वास्तव झाकोळून जातं हेही तितकंच खरं आहे.

उदाहरणार्थ,काफर शिवाजी महाराजांना वळणावर आणायला त्यांनी पाठवलेला मिर्झाराजे जयसिंग नावाचा सुप्रसिद्ध सरदारही स्वतः काफरच होता.

'शिवभारत' हे शिवाजी महाराजांच्या हातून घडलेल्या महान कृत्यांची प्रशंसा करणारे महाकाव्य त्यांच्या जीवनकाळातच लिहिलं गेलं.त्यात एकीकडे त्यांच्या राजकीय तत्त्वज्ञानाचा दृष्टिकोन दिसतो,तर दुसरीकडे प्रत्यक्ष व्यवहारातील मुस्लीम आणि हिंदू हितसंबंधांच्या दीर्घकालीन दुव्यांनाही मान्यता दिली जाते.

दरबारी कवींच्या म्हणण्यानुसार शिवाजी महाराज प्रत्यक्ष विष्णूचा अवतार होते.त्यांनी बेलगाम मुस्लीमांच्या मुसक्या वळल्या होत्या,ते 'गोब्राह्मणप्रतिपालक' होते आणि शत्रू सुलतानांवर हल्ला करण्यासाठीच या पृथ्वीवर त्यांनी अवतार घेतला होता.इस्लामी सत्ता ही दुष्ट शक्ती होती आणि "रानटी रूपाच्या आड दडून त्यांनी पृथ्वीवर जन्म घेतला होता.त्यांच्यावर विजय मिळवून त्यांना आपल्या अधीन करणे गरजेचे होते. (परंतु त्या काळात समुद्रकिनाऱ्यावर पोहोचलेल्या युरोपिअनांएवढे हे मुस्लीम दुष्ट नव्हते.युरोपिअन लोक तर दैवी अंदाजानुसार अधिकच खालच्या पातळीवरचे होते.) म्लेंच्छ धर्म (परदेशी धर्म) इथं वाढत चालले आहेत अशी तक्रार शिवभारतात करण्यात आली आहे. त्यामुळे सज्जन आणि न्यायी लोकांत खूपच भय निर्माण झालं आहे.ही सर्व मुस्लीम घराणी म्हणजे राक्षसांचे पुनरावतारच आहेत आणि त्यांचा स्वतःचा धर्म घेऊन पुरासारखी या पृथ्वीवर पसरत आहेत,"असंही त्यात लिहिलं आहे.असं सगळं वर्णन करून झाल्यावर समतोल राखण्याची शास्त्रीय संकल्पना प्रत्यक्षात आणणारी आणि न्यायाची संस्कृत परंपरा अमलात आणणारी व्यक्ती म्हणून शिवाजी महाराजांना सादर करण्यात आलं आहे.परंतु हे प्रखर चित्र एकीकडे उभारलेलं असलं तरी ती महत्त्वाकांक्षा औपचारिकरीत्याच व्यक्त केलेली आहे,प्रत्यक्षात शिवभारताने अधिक गुंतागुंतीच्या सांस्कृतिक विश्वाला मान्यता दिलेली दिसते.उदाहरणार्थ,त्यात म्हटलं आहे की,पुराणातील कार्तिकेय एका असुराशी लढताना त्याला जशी देवांनी मदत केली,त्याचप्रमाणे मलिक अंबरलाही मोगलांशी लढताना शिवाजी महाराजांचे पिता आणि अन्य सरदारांनी मदत केली.म्हणजे या ठिकाणी मलिक अंबर या आफ्रिकन मुस्लीमाला त्यांनी 'कार्तिकेय' या हिंदू देवाची उपमा देऊन उत्तरेकडील बलवान मोगल शत्रूला 'असुर' म्हटलं आहे.शाहजीराजे विजापूरच्या अदिलशाहकडे म्हणजे दख्खनच्या दुसऱ्या सुलतानाकडे जाण्यासाठी निजामशाहची नोकरी सोडतात तेव्हा निजामशाहसोबत एकत्र व्यतीत केलेल्या भूतकाळाबद्दल भावूक झालेले दिसून येतात.

त्यांनी तर निजामशाहच्या राज्याचं वर्णन 'रामराज्या सारखं केलं आहे.शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजीराजेही निजामशाहचे सहकारी होते.त्याचं वर्णन तर या शिवभारतात 'धर्मात्मा' असं केलेलं असून तुर्काच्या विरुद्ध मारलेले टोमणे त्याला लागू होत नाहीत,असंही म्हटलं आहे.शिवाय जेव्हा शिवाजी महाराजांचा बंदोबस्त करण्यासाठी खास अफझल खानाला पाठवलं गेलं, तेव्हा त्याच्या सोबत जाधव,भोसले,नाईक,घोरपडे आणि अन्य बऱ्याच मराठ्यांना पाठवलं गेलं होतं.तर सिद्दी इब्राहिमसारख्या मुस्लीमांनी शिवाजी महाराजांच्या पायी आपली निष्ठा वाहिलेली दिसते.त्या काळातली मुस्लीम बाजू ही 'चांगल्या' आणि 'वाईट' अशा दोन्ही पद्धतींत विभागली जाऊ शकत होती.परंतु आधीपासूनच गृहीत धरलेल्या एकसारख्या रंगात त्यांना कधीच रंगवलेलं यात दिसत नाही.विजापूरचा अदिलशाह (दुसरा) हा सुन्नी मुस्लीम असूनही हिंदू देवतांची भक्ती करत होता,तर त्याचा वारस मात्र 'दुष्टबुद्धी' दाखवला गेला आहे.या सगळ्यांत मोगल मंडळीच स्वतःला खरेखुरे मुस्लीम मानत होती.त्यांच्या दृष्टीने दख्खनचे मुस्लीम इस्लामचे 'शत्रू' होते आणि मरहट्टे तर 'सैतानाचे दूतच' होते.

त्यामुळे सैद्धांतिकदृष्ट्या पाहता,शिवभारताने इस्लामी राजा नसलेलं 'हिंदवी स्वराज्य' नजरेसमोर पाहिलं असलं,तरी खुद्द शिवाजी महाराजांच्या कवीलाही या खळबळजनक कालखंडातील मुस्लीम-मराठा बंधांकडे डोळेझाक करता आली नव्हती.शिवाजी महाराजांच्या राजकीय पूर्वजांच्या दरबारी संस्कृतीपेक्षा ही विचारसरणी वेगळी होती आणि प्रत्यक्षातलं वास्तव हे एकमेकांच्या आधाराने उभं राहणारं मिश्र वास्तव होतं. त्यातलं एकही वास्तव पूर्णपणे एकट्याचाच प्रभाव पाडणारं असं नव्हतं.शिवभारताने आणखीही एक महत्त्वाची भूमिका बजावली,संस्कृताधारित पंरपरेवरील भर हा त्या भूमिकेत अंतर्भूतच होता.केवळ एक 'सरदार' या स्थानावरून 'अभिषिक्त राजा' म्हणून लोकांपुढे सादर करण्यासाठी राज्याभिषेक सोहळा आयोजला गेला.त्या सोहळ्याआधी वेळेवर लिहून पूर्ण झालेलं हे काव्य 'सार्वभौम राजा' म्हणून महाराजांची वैधता लोकांसमोर मांडण्यासाठी गरजेचं होतं.

अर्थात 'हिंदू' हा शब्द वापरून आपली स्व-प्रतिमा बनवण्याची संकल्पना काही मूळची नव्हती कारण विजयनगरच्या सम्राटांनीही तो शब्द स्वप्रतिमेसाठी वापरला होता,तरीही जराही विरोधाभास न बाळगता अन्य हिंदू राजांशी ते लढले होते आणि मुस्लीमांना तर त्यांनी हजारोंच्या संख्येने आपल्या नोकरीतही घेतले होते.अशाच एका तेलुगू ग्रंथात त्याचा उल्लेख या पुस्तकात पुढेही येणारच आहे - तर शिवाजी महाराजांचा जन्म होण्यापूर्वीही 'हिंदवी स्वराज्याची' संकल्पना मांडली आहे.त्यात काही मुस्लीम राजांची तुलना खुद्द सैतानाशी केली आहे आणि मोगलांना मात्र देवाचे आशीर्वाद मिळाले आहेत, असं लिहिलं आहे. इस्लामी ग्रंथांतही 'काफरांचा नायनाट' अशा अतिशयोक्त संकल्पना मांडलेल्या असतात हे मी मागच्या लेखात मांडलेच आहे;परंतु प्रत्यक्षातले वास्तव काहीतरी वेगळेच असते.त्या वास्तवाने जगाचे आकलन केले होते,ते केवळ काळ्या आणि पांढऱ्या अशा रंगांतूनच केलेले नव्हते.काही अभिजनांनी 'तुर्कांचे' स्वरूप मांडले होते,तर काहींनी हिंदूंचे स्वरूप मांडले होते.परंतु दोन्हींतील सीमारेषा ठाशीव,ठळक अशा नव्हत्या.

शिवभारताच्या एका अध्यायात खरोखरच असं म्हटलं आहे,की शिवाजी महाराजांना जी जी राज्ये जिंकायची होती,ती केवळ दुर्जन तुर्काचीच नव्हती तर मद्रास, कंदाहार,काश्मीर आणि केरळ यांचीही जिंकायची होती. तसंच बरीच लहानमोठी हिंदू राज्येही मुस्लीम राज्यांप्रमाणेच त्यांच्या हिंदवी स्वराज्याच्या संकल्पनेशी जुळणारी नव्हती.शिवाजी महाराज हे त्यांच्या काळातील प्रस्थापित यंत्रणेसमोर 'आव्हान' म्हणून उभे राहिले होते.कारण ती प्रस्थापित यंत्रणा 'फारसी' भाषेचे प्राबल्य असलेली इस्लामी होती.पण ते 'सिंह' होते आणि त्यांच्या विरुद्ध उभं राहणाऱ्या हिंदू आणि मुस्लीम दोन्ही हत्तींना आव्हान देत होते.जाणीवपूर्वकच त्यांनी संस्कृताधारित आव्हान दिलं होतं हे नक्कीच;परंतु त्यांचं राज्य आजच्या काळातील व्याख्येशी कधीकधी जोडलं जातं,तसं ते 'हिंदुराष्ट्रवादी' राज्य खरोखरचं होतं का? की त्यांची दुनिया वेगवेगळ्या धर्मपंथांचा मिलाप करणारी एक सर्वसमावेशक दुनिया होती? तर या प्रश्नाचं उत्तर या दोन्ही टोकांच्या मध्ये कुठेतरी होती असं येतं.तिथली संस्कृती आणि लोकांची आयुष्ये हा सामाईक अनुभवांचा समुद्र होता.अभिजनांच्या राजकारणाने परस्पर स्पर्धा करणारे लेखनच खरं आहे असे प्रस्थापित केले.तर शिवाजी महाराजांनी त्यांच्या भूमीतील निवडक पंरपरा आणि विचारधारेचे नैतिक बळ यांच्याकडून ऊर्जा घेऊन आपल्या मराठा साम्राज्याची स्थापना केली.ते ज्या दख्खनमध्ये जन्मले होते,तिथे हिंदू राजकुमारांनी मुस्लीम प्रभाव स्वीकारला होता आणि मुस्लीम राजे हिंदू दैवतांची पूजा करत होते.त्या भूमीने ब्राह्मण लोकांना सुलतान बनलेलं बघितलं आणि मुसलमानाने ब्राह्मणत्व स्वीकारलेलं पाहिलं.तथापि,आता मात्र भारताच्या इतिहासात एक नवीनच अध्याय उघडलेला दिसतो.त्यात ही भूमी मोगलांच्या आणि त्यांच्या पराक्रमी साम्राज्याचे कबरस्तान म्हणून दाखवली जाते आणि या महान परिवर्तनाच्या अग्रभागी उभे असतात, छत्रपती शिवाजी महाराज.... संस्कृत काव्यानुसार विष्णूचा अवतार आणि वास्तवात पाहता एक लढाऊ राजा !

■■■ समाप्त ■■■