* विजय गायकवाड | Vijay Gaikawad

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

१०/४/२३

जेव्हा वेळप्रसंग येतो तेव्हा आपण एकाकीच असतो.ही सांगणारी गोष्ट.. भाग शेवटचा

तसं असेल तर मग त्या फेब्रुवारीतल्या दुपारी रुबेन,

रायनर,रिंक आणि वित्झे यांनी अँमस्टरडॅममधल्या बर्फासारख्या थंडगार कालव्यात का उडी मारली यात काहीच रहस्य नाही की! हा तर त्यांचा नैसर्गिक प्रतिसाद होता. आता प्रश्न असा आहे की,१३ मार्च १९६४च्या रात्री किटी जिनोवेजेचा खून झाला तेव्हा काय घडलं? त्या सर्वज्ञात कहाणीतलं नक्की काय काय खरं आहे?साक्षीदारांनी दाखवलेल्या बेफिकिर वृत्तीबद्दल प्रश्न उपस्थित करणाऱ्या सुरुवातीच्या लोकांमधील जोसेफ डी मे हा क्यू गार्डन येथे नव्यानं राहायला आलेला रहिवासी होता.तो नवागत इतिहासकार होता आणि किटीच्या मृत्यूनंतर दहा वर्षांनी तिथं राहायला आला होता.त्या वस्तीला बदनाम करणारी ती हत्या झाली तरी कशी असावी,याबद्दल त्याला कुतूहल वाटलं म्हणून त्याने स्वतःच शोध घ्यायचं ठरवलं.त्यासाठी तो वेगवेगळ्या माहिती संग्रहांतली माहिती शोधू लागला.पुसट झालेले फोटो,जुनी वृत्तपत्रं,पोलीस अहवाल वाचू लागला.मग सगळ्या गोष्टी एकत्र केल्यानंतर नक्की काय घडल होत ते चित्र त्यांच्या नजरेसमोर उमटलं.आपण पुन्हा अगदी पहिल्यापासून सुरुवात करू.या वेळेस डी मे आणि त्याच्या सहकाऱ्यांनी खूप मेहनत घेऊन केलेल्या चौकशीवर १३ मार्च,१९६४ रोजी घडलेल्या वा घटना आधारलेल्या आहेत.पहाटेचे ३.१९ - एका काळीज गोठवणाऱ्या किंकाळीनं ऑस्टीन रस्त्यावरील शांतता भंग पावली;परंतु बाहेर तर खूपच थंडी होती आणि बहुतेक रहिवाशांच्या घरांच्या खिडक्या बंद होत्या.रस्त्यावर फारसे दिवेही नव्हते.ज्या लोकांनी खिडकीबाहेर पाहिलं,त्यातील बहुतेकांना तिथं काही विचित्र होतंय असं वाटलंच नाही.

काहींना रस्त्यावरून दिव्याच्या अंधुक उजेडात एक स्त्री ओझरती दिसली;परंतु त्यांना वाटलं की ती बहुतेक दारू पिऊन झिंगली आहे.तेही काही विचित्र नव्हतं.कारण,

त्याच रस्त्यावर पुढे एक बारही होता.तरीही कमीत कमी दोन रहिवाशांनी फोन करून पोलिसांना बोलावलं.त्यातले एक होते मायकेल हॉफमनचे वडील,मायकेल हॉफमन नंतर पोलीस दलात भरती झाले.दुसरी होती हॅटी ग्रुंड.ती जवळच्याच इमारतीत राहत होती.'आम्हाला आधीच फोन आलेत,'असं पोलिसांनी म्हटल्याचं तिने काही वर्षांनी सांगितलं.पण पोलीस तर आलेच नाहीत.पोलीस का नाही आले? त्यांनी ठाण्यातून सुसाट धाव घेत जोरजोरात सायरन वाजवत खरं तर यायला हवं होतं.त्या स्थळी पोलिसांची मदत धाडणाऱ्या वरिष्ठांना वाटलं की,हा काहीतरी वैवाहिक भांडणाचा प्रकार आहे.आता पोलीस दलातून निवृत्त झालेल्या हॉफमनना वाटतं की म्हणूनच ते प्रत्यक्ष हत्येच्या ठिकाणी एवढे उशिराने पोहोचले.हेही लक्षात घेतलं पाहिजे की, त्या काळात एखादा नवरा बायकोला मारत असेल तर लोक फार लक्ष देत नसत आणि विवाहातील बलात्कारास तर गुन्हा मानण्याचा प्रश्नच उद्भवत नव्हता.

पण मग या ३८ साक्षीदारांचं काय ?

हा नाठाळ आकडा आला तरी कुठून? गाण्यांतून,नाटकांतून,प्रसिद्ध चित्रपटांतून,सर्वाधिक खपाच्या पुस्तकांत सातत्यानं सांगितला.गेलेला हा आकडा पोलीस खात्यातील हेरांनी प्रश्न विचारलेल्या लोकांच्या यादीतून आला.या यादीतील बहुसंख्य लोक प्रत्यक्ष गुन्हा पाहणारे साक्षीदार नव्हते.त्यातील बहुतेकांनी 'काहीतरी'आवाज ऐकला होता आणि त्यातल्या काही जणांना तर झोपेतून जागही आली नव्हती.फक्त दोन जण त्यास अपवाद होते.त्यातला एक जण होता जोसेफ फिंक हा त्याच इमारतीतला शेजारी होता.तो विक्षिप्त,माणूसघाणा होता.तो ज्यूद्वेष्टा म्हणून लोकांना माहिती होता (स्थानिक मुलं त्याला अँडॉल्फ असं म्हणायची).जेव्हा तो प्रसंग घडला तेव्हा तो टक्क जागा होता.त्याने किटीवरला पहिला हल्ला पाहिलाही होता आणि तरीही काही केले नव्हतं.किटीला तिच्या कमनशिबावर सोडून देणारा दुसरा माणूस होता.कार्ल रॉस हा शेजारी तिचा आणि मेरी अँनचा मित्र होता. तिच्यावर जिन्यापाशी झालेला दुसया हल्ला त्यानं स्वतःच्या डोळ्यांनी पाहिला होता. (प्रत्यक्षात तिच्यावर तीन नव्हे,दोन हल्ले झाले.)परंतु तो घाबरला आणि तिथून पळूनच गेला.रॉसनेच पोलिसांना सांगितलं होतं की,मला या लफड्यात पडायचं नाही.परंतु त्याच्या म्हणण्याचा अर्थ असा होता की,त्याला प्रसिद्धी नको होती.त्या रात्री तो प्यायलेला होता, त्याशिवाय तो समलिंगी आहे हेही बाहेर येईल की काय अशी त्याला भीती वाटली होती.त्या काळात समलैंगिकता पूर्णपणे बेकायदेशीर होती.रॉसला पोलिसांची आणि न्यू यॉर्क टाइम्ससारख्या वृत्तपत्रांची भयंकर भीती वाटत होती.

कारण,समलैंगिकता हा धोकादायक आजार आहे.असा कलंक त्या दोघांनीही समलैंगिकतेस लावला होता.

समलैंगिक पुरुषांना पोलीस छळत असतच,त्याशिवाय समलैंगिकता हा प्लेगच आहे.असं चित्र वृत्तपत्रेही रंगवत असत (खास करून किटीचं नाव सर्वतोमुखी करणाऱ्या एब रोझेन्थाल या संपादकास समलैंगिक लोकांबद्दल तीव्र नापसंती होती.किटीच्या खुनाच्या थोडंसं अगोदर त्याने आणखी एक लेख लिहिला होता त्याचा मथळा असा होता - शहरामध्ये राजरोसपणे चाललेल्या समलैंगिकतेत वाढ झाल्यामुळे लोकांना चिंता वाटू लागली आहे).अर्थात यातल्या कुठल्याही सबबीमुळे कार्ल रॉसच्या बेजबाबदारपणावर पांघरूण घालणं शक्य नाही.जरी तो दारू प्यायलेला असला,घाबरलेला असला तरी मैत्रिणीला वाचवण्यासाठी त्याने अधिक काहीतरी पावलं उचलायला हवीच होती.तसं काही करण्याऐवजी त्याने आणखी एका मित्राला फोन केला.त्या मित्राने ताबडतोब पोलिसांना बोलवायला सांगितलं;परंतु रॉसला स्वतःच्या घरातून तो फोन करण्याचे धैर्य झालं नाही म्हणून त्याने गच्चीवर जाऊन शेजारच्या घरातील महिलेला सांगितलं,तिथं राहणान्या बाईनी तिच्या शेजारी राहणाऱ्या दुसऱ्या महिलेला उठवलं.ती दुसरी महिला होती.सोफिया फॅरार किटी खाली जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात पडली आहे.हे ऐकताक्षणी ती क्षणभरही थांबली नाही. ती धावत घराबाहेर पडली तेव्हा तिचा नवरा पँट चढवत होता आणि 'थांब थांब,मी आलो,' असं तिला सांगत होता.सोफियाला जे काही कळलं होतं,

त्यानुसार कदाचित तीही थेट त्या खुन्याच्या विळख्यात सापडू शकत होती;परंतु त्यामुळेही ती थांबली नाही.तिने नंतर सांगितलं,"मी मदतीसाठी धावले.तेच करणं त्या परिस्थितीत स्वाभाविक होतं.

किटी पडली होती त्या जिन्याचा दरवाजा उघडून ती गेली तोवर खुनी पळून गेलेला होता. सोफियाने आपल्या मैत्रिणीला मिठी मारली तेव्हा किटी तिच्या कुशीत शिरत क्षणभरासाठी विसावली.अशा प्रकारे,कॅथरिन सुसान जिनोवेजे आपल्या शेजारणीच्या मिठीतच मरणाला सामोरी गेली.ही कहाणी पुष्कळ वर्षांनी कळली तेव्हा किटीचा भाऊ बिल म्हणाला की,'किटी तिच्या मैत्रिणीच्या मिठीत असताना मृत्यू पावली हे तेव्हा कळल असतं तर आमच्या कुटुंबाला कितीतरी फरक पडला असता.'

मग सोफिया विस्मृतीत का गेली असावी ?

कुठल्याही कागदपत्रात तिचा उल्लेख का नसावा?त्यामागचं सत्य अगदीच निराश करणारं होतं.सोफियाच्या मुलाच्या म्हणण्यानुसार,'माझी आई तेव्हा एका वृत्तपत्रातील महिलेशी बोलली होती.'परंतु जेव्हा तो लेख दुसऱ्या दिवशी छापून आला तेव्हा त्यात लिहिलं होतं की,'सोफियाला त्या भानगडीत पडायचं नव्हतं.'तो भाग वाचून सोफिया खूपच भडकली होती आणि 'यानंतर कुठल्याही पत्रकाराशी आपण बोलणार नाही' अशी तिने प्रतिज्ञाच केली होती.तसं म्हणणारी सोफिया एकटीच नव्हती.खरं सांगायचं तर क्यू गार्डनच्या डझनावारी रहिवाशांनी तक्रार केली होती की,पेपरवाले लोक आमचे शब्द सोईस्करपणे आहेत.त्यातील कित्येक जण नंतर ती वस्ती सोडूनही गेले.दरम्यानच्या काळात पत्रकार मंडळी मात्र येतच राहिली.११ मार्च, १९६५ रोजी म्हणजे किटीच्या मृत्यूला होण्याच्या दोन दिवस अगोदर एका वार्ताहराला वाटलं की, आपण क्यू गार्डन परिसरात जाऊन मध्यरात्रीच्या वेळेस 'खून होतोय खून' अशी बोंब ठोकून 'विनोद' करावा,तेव्हा छायाचित्रकार आपले कॅमेरे तयार ठेवून रहिवाशांच्या प्रतिक्रिया फोटोबद्ध करण्यासाठी सज्ज होऊन उभे होते.

हा सगळा प्रकारच वेडेपणाचा होता.त्याच कालखंडात न्यू यॉर्क शहरात चळवळीचा जोर वाढू लागला होता.मार्टिन ल्युथर किंग यास नोबेल शांतता पुरस्कार मिळाला होता,त्यामुळे लाखो अमेरिकन लोक रस्त्यांवरून मोर्चे काढू लागले होते आणि न्यू यॉर्क शहराच्या क्वीन्स भागात तर २००हून अधिक सामाजिक संस्था उभारल्या गेल्या होत्या. 'बेपर्वाईची साथ' या विषयाचं वृत्तपत्रांना वेडच लागलं होतं आणि ते त्याच विषयाची रेकॉर्ड वाजवत बसले होते.डॅनी मीनान नावाचा एक पत्रकार आणि रेडिओ वार्ताहर होता.त्याला 'निष्क्रिय' बघ्यांच्या कहाणीबद्दल शंका वाटत होती.जेव्हा त्याने खऱ्या गोष्टी तपासून पाहिल्या तेव्हा कळलं की,बहुतेक साक्षीदारांना त्या रात्री वाटलं होतं की,आपण एका दारू प्यायलेल्या स्त्रीला पाहिलं आहे.मग मीनानने न्यू यॉर्क टाइम्सच्या वार्ताहराला विचारलं की,'तू ही माहिती तुझ्या बातमीत का दिली नाहीस?' त्यावर त्याने उत्तर दिलं की,'त्यामुळे माझ्या बातमीचीच वाट लागली असती.' पण मग मीनानने ती गोष्ट स्वतःकडेच का ठेवली ? स्वतःचं नुकसान होऊ नये म्हणून त्याने तसं केलं.त्या काळात एकट्या दुकट्या पत्रकाराला स्वतःची नोकरी टिकवायची असेल तर जगातील सर्वांत शक्तिमान वृत्तपत्राच्या विरोधात जाणं शक्य नव्हतं.काही वर्षांनी आणखी एका पत्रकाराने त्याविरुद्ध बोलण्याचा प्रयत्न केला,तेव्हा त्याला न्यू यॉर्क टाइम्स वृत्तपत्रातून एब रोझेंथालने रागारागाने फोन केला.'ही कहाणी म्हणजे अमेरिकेतील परिस्थितीचं प्रतीकच बनली आहे हे तुला माहितीय का? ती तर समाजशास्त्राचे अभ्यासक्रम,पुस्तकं आणि लेखांचे विषयही बनली आहे आणि तिच्याविरुद्ध तू टिप्पणी करतोस.?"प्रत्यक्षात त्या मूळ कथेचा किती छोटा भाग राहिला ते पाहून धक्काच बसतो.त्या दुर्दैवी रात्री सर्वसामान्य न्यू यॉर्कवासी कर्तव्याला चुकले नाहीत,तर अधिकाराच्या जागेवरील लोक कर्तव्याला चुकले.किटी एकाकी अवस्थेत मेली नाही तर आपल्या मैत्रिणीच्या मिठीत तिनं प्राण सोडला.अगदी मुळाशीच जायचं म्हटलं तर विज्ञान सांगतं तसा बघ्यांच्या उपस्थितीचा निष्क्रिय परिणाम होत नाही तर त्याच्या विरुद्धच परिणाम होतो.आपण मोठ्या शहरात,सबवेवर,गर्दीच्या रस्त्यांवर एकटे नसतो,

आपण एकमेकांना असतो.आणि किटीची कहाणी तिथेच संपत नाही.त्या कहाणीला एक शेवटचं,विचित्र वळणही आहे.किटीच्या मृत्यूनंतर पाच दिवसांनी क्वीन्स परिसरातील रहिवासी राऊल क्लिअरी याला रस्त्यावर एक अनोळखी माणूस दिसला. तो दिवसाढवळ्या एका शेजाऱ्याच्या घरातून बाहेर येत होता,त्याच्या हातात टीव्ही सेट होता. राऊलने त्याला अडवलं तेव्हा त्याने म्हटल की, मी सामान हलवणारा माणूस आहे.परंतु राऊलला शंका आली म्हणून त्याने जॅक ब्राऊन नामक शेजाऱ्याला फोन केला. "बॅनिस्टर्स घर सोडून चालेलत का?" त्याने विचारलं."छे,नाही हो,"ब्राऊनने उत्तर दिलं.मग त्या दोघांनी अजिबात वेळ दवडला नाही.जॅकने त्या माणसाच्या गाडीच्या चाकातली हवा काढली आणि राऊलने पोलिसांना फोन केला.पोलीस घरफोड्याला पकडायला आले आणि ज्या क्षणी तो माणूस पुन्हा बाहेर आला त्या क्षणी त्यांनी त्याला पकडलं.त्यानंतर काही तासांनी त्या माणसाने कबुलीजबाब दिला.

म्हणजे ते घर फोडून तो आत घुसला होताच शिवाय त्याने क्यू गार्डन परिसरात एका तरुणीचा खूनही केला होता.बरोबर! म्हणजे किटीच्या खुन्याला पकडलं होतं तर खरं तर दोन बघ्यांच्या हस्तक्षेपामुळे तो पकडला गेला होता;परंतु एकाही वृत्तपत्राने ती बातमी दिली नव्हती.किटी जिनोवेजेची ही खरी कहाणी आहे.ही कहाणी मानसशास्त्राच्या पहिल्या वर्षांच्या विद्यार्थ्यांनीच नव्हे तर पत्रकार होऊ इच्छिणाऱ्यांनीही वाचली पाहिजे.

कारण,ही कहाणी आपल्याला तीन गोष्टी शिकवते.एक म्हणजे मानवी स्वभावाबद्दल आपला दृष्टिकोन किती ठाकून ठोकून विचित्र बनवलेला आहे. दुसरी म्हणजे सनसनाटी बातम्या विकण्यासाठी पत्रकार मंडळी किती सहजगत्या अचूक बटणं कशी दाबतात आणि तिसरी पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे संकटाच्या वेळी आपण एकमेकांवर कसे अवलंबून राहू शकतो.आम्ही अँमस्टरडॅममध्ये पाण्याकडे पाहत होतो तेव्हा मी रुबेन अब्राहम्सला विचारलं की,पाण्यात उडी मारल्यामुळे तुला आपण 'हिरो' बनलो असं वाटलं का? त्याने खांदे उडवत म्हटलं, 


'नाही हो,त्यात विशेष काय? लोकांनी जीवनात एकमेकांची काळजी घेतलीच पाहिजे ना.'


संपली एकदाची गोष्ट

८/४/२३

जेव्हा वेळप्रसंग येतो तेव्हा आपण एकाकीच असतो.ही सांगणारी गोष्ट.. भाग २

किटी जिनोवेजेबद्दल पहिल्यांदा वाचलं तेव्हा मी विद्यार्थी होतो.माल्कम ग्लॅडवेलचं पदार्पणातील पहिलं वहिलं पुस्तक द टिपिंग पॉइंट हे लाखो लोकांप्रमाणे मी ही अधाश्यासारखं वाचून काढलं होत.त्या पुस्तकाच्या २७व्या पानावर मला त्या ३८ साक्षीदारांबद्दल कळलं.मिलग्रामचं शॉक मशिन आणि झिबार्डोच्या तुरुंग कहाणीसारखीच यादेखील कहाणीने माझ्या मनाची पकड घेतली. त्यानंतर कित्येक वर्षांनी रोझेन्थालने म्हटलं की,'अजूनही मला या कहाणीसंबंधी मेल येतात.लोकांना ही कहाणी पछाडते.ती एखाद्या जादुई रत्नासारखी आहे.तुम्ही तिच्याकडे बघत राहता आणि दर वेळेस नवनव्या गोष्टी तुम्हाला जाणवू लागतात.'१३ एप्रिल शुक्रवारचा तो दुर्दैवी दिवस नाटकं आणि गीतांचा विषय बनला.

सनफिल्ड,गर्ल्स अँड लॉ अँड ऑर्डर या मालिकेचे सगळे भाग याच विषयाला वाहिलेले होते.क्यू गार्डन येथे १९९४मध्ये केलेल्या भाषणात अध्यक्ष बिल क्लिंटन यांनी किटीच्या हत्येच्या रक्त गोठवून टाकणाऱ्या संदेशाची आठवण जागवली.अमेरिकेच्या संरक्षण खात्याचे उपसचिव पॉल बुल्फोवित्झ यांनी तर २००३ साली अमेरिकेने इराकवर आक्रमण केलं,त्याचं समर्थन करताना या प्रकरणाचा उल्लेख करून सुचवलं की,या युद्धास विरोध करणारे अमेरिकन लोक हे त्या ३८ साक्षीदारांसारखे निष्क्रिय बघे आहेत.या कहाणीचं तात्पर्य स्पष्ट आहे असं मला वाटत होतं.'किटी जिनोवेजेच्या मदतीला कुणीही का गेलं नसावं ? तर लोक निष्काळजी आणि बेपर्वा होते म्हणून.'या संदेशाने गती पकडल्याने किटी जिनोवेजे हे नाव घरोघरी पोहोचलं होतं तो काळ आणि लॉर्ड ऑफ द फ्लाइज हे पुस्तक सर्वाधिक खपाचं होण्याचा काळ एकच होता.याच काळात आईकमनवर खटला दाखल झालेला होता, स्टॅन्ली मिलग्रामचे 'विजेचे झटके' जगभर पोहोचले होते आणि झिबार्डीने आपल्या कारकिर्दीची मुहूर्तमेढ रोवली होती.परंतु मी किटीच्या मृत्यूभोवतीच्या परिस्थितीवरील संशोधन वाचू लागलो,

तेव्हा मला एका पूर्णतया वेगळ्याच कहाणीचा सुगावा लागला,पुन्हा एकदा तसं घडलं होतं.बिच तटाने आणि जॉन डालें हे दोन तरुण मानसशास्त्रज्ञ होते.

'आणीबाणीच्या प्रसंगी प्रेक्षक किटीच्या हत्येनंतर लगेचच त्यांनी एक प्रयोग करायचं ठरवलं.प्रयोगातले सहभागी कसलीही आगाऊ पूर्वसूचना न दिलेले कॉलेज विद्यार्थी होते.

त्यांना एका बंद खोलीत एकटच बसून इंटरकॉमवरून सहाध्यायांशी कॉलेज जीवनाबद्दल गप्पा मारा,असं सांगण्यात आलं.फक्त तिथं पलीकडच्या बाजूला कुणीही विद्यार्थी नव्हता.संशोधकांनी त्याऐवजी एक आधीपासून ध्वनिमुद्रित केलेली टेप लावली होती. कुठल्यातरी क्षणी एक आवाज विनवणी करून म्हणत होता,"मला मदतीची गरज आहे,मला कुणीतरी मदत करा.कऽरा मऽदऽत" मग जरा घुसमटल्यासारखा आवाज काढून,"मी मरतोय रे मरतोयऽऽऽ..." त्यानंतर पुढे काय झालं? जेव्हा त्या सहभागी व्यक्तीला वाटायचं की,आपण एकट्यानेच ही मदतीची हाक ऐकली आहे तेव्हा ती धावत धावत बाहेरच्या मार्गित येत असे.एकही अपवाद न वगळता त्या सर्वांनी मार्गिकत धाव घेतली होती;परंतु ज्या मुलाना सांगितलं होतं की,जवळपासच्या खोल्यांमध्ये आणखी पाच विद्यार्थी बसलेले आहेत,त्यांच्यापैकी फक्त ६२ टक्क्यांनी प्रत्यक्ष कृती केली होती... अरेच्चा ! म्हणजे हाच होता का तो निष्क्रिय बघेपणा...

लटाने आणि डालें यांच्या शोधांनी 'सामाजिक मानसशास्त्र' विषयात दिलेलं योगदान भरीवच म्हणावं लागेल.'आणीबाणीच्या प्रसंगी बघे लोक कसं वर्तन करतात.' यावर पुढील वीस वर्षांत हजारहून अधिक लेख आणि पुस्तकं प्रकाशित झाली आहेत.क्यू गार्डनमधील - ३८ जणांच्या निष्क्रियतेचं स्पष्टीकरणही या निष्कर्षांमुळे मिळालं आहे किटी जिनोवेजेच्या 

किंकाळ्यांनी 'संपूर्ण वस्ती जागी झाली होती'आणि तरीही किटी मेली होती या मागचं कारण 'संपूर्ण वस्ती जागी झाली होती.'हेच होतं.बाजूच्या इमारतीत राहणाऱ्या महिलेने नंतर एका वार्ताहराला सांगितलेल्या माहितीतून ही गोष्ट उदाहरणासहीत समोर उभी राहते.

तिचा नवरा पोलिसांना बोलवायला निघाला होता तेव्हा तिने त्याला अडवलं होतं,'मी त्याला म्हणाले की,त्यांना तीस बत्तीस फोन गेले असतील आत्तापर्यंत,नको करूस फोन.' याचा अर्थ किटीवरचा हल्ला एखाद्या निर्मनुष्य गल्लीत एकाच साक्षीदारासमोर घडला असता तर ती त्यातून कदाचित वाचलीही असती.

या सगळ्यामुळे किटीच्या प्रसिद्धीत भर पडली. तिच्या कहाणीला मानसशास्त्राच्या 'अव्वल दहा' पुस्तकांत जागा मिळाली.आजही पत्रकार आणि व्यासंगी विद्वान त्या कहाणीचा संदर्भ देतात. महानगरातील धोकादायक 'बिनचेहरे'पणाची ती आधुनिक बोधकथाच बनली आहे.

बरीच वर्षं मी समजत होतो की,'निष्क्रिय बघे प्रवृत्ती' ही महानगरीय जीवनाचा अटळ भाग आहे;पण त्यानंतर मी ज्या शहरात काम करत होतो, तिथंच काहीतरी घडलं,

त्यामुळे मला माझी गृहीतकं पुन्हा एकदा तपासून पाहावी लागली.९ फेब्रुवारी,२०१६चा दिवस होता तो.दुपारी पावणेचार वाजता अँमस्टरडॅममधील कालव्याला लागून असलेल्या स्लोटरकेड रस्त्यावर सॅनीने तिची पांढरी अल्फा रोमियो गाडी लावली. गाडीतून बाहेर पडून ती बाजूच्या आसनावर बसवलेल्या लहान बाळाला घ्यायला वळली. तेवढ्यात तिला जाणवलं की,गाडी तर पुढे पुढेच चालली आहे.सॅनी कशीबशी उडी मारून स्टिअरिंगमागे जाऊन बसली;परंतु ब्रेक दाबायला तोवर उशीर झाला होता त्यामुळे गाडी कालव्यात खाली पडली आणि बुडू लागली.वाईट बातमी-डझनावारी बघे ते घडताना नुसतेच बघत राहिले.तिथे आणखीही काही लोकांनी सॅनीचा आक्रोश ऐकला होता.क्यू गार्डनप्रमाणेच याही ठिकाणी संकट दिसू शकेल अशी अपार्टमेंट्स होती. हीसुद्धा एक टुमदार,उच्च मध्यमवर्गीय वस्तीच होती.परंतु नंतर काहीतरी अनपेक्षित घडलं. 

कोपऱ्यावरील इस्टेट एजन्सीचा मालक रुबेन अब्राहम्स याने नंतर स्थानिक टीव्ही वार्ताहराला सांगितलं,'ती उत्स्फूर्त प्रतिक्रिया होती.मोटार पाण्यात जातेय,हे काही चांगलं नाही.असा विचार मनात येऊन मी ऑफिसातल्या टूलबॉक्समधून हातोडा घेतला आणि त्या थंडगार पाण्यात उडी मारली.

तो उंच,कमावलेल्या शरीराचा,दाढीचे केस पांढरे होऊ लागलेला रुबेन जानेवारीतल्या एका थंडगार दिवशी मला भेटला.हा प्रसंग कुठे घडला ते त्यानं मला दाखवलं.'तो अगदी विचित्र योगायोगच होता,सगळ्या गोष्टी अगदी निमिषार्धात घडून आल्या.' रुबेननं कालव्यात उडी मारली तेव्हा आणखी एक प्रेक्षक रिंक केंटी यानंही पाण्यात उडी मारलेली होती आणि तो बुडत्या मोटारीकडे जात होता.

त्याशिवाय रायनर बॉश हा आणखीही एक प्रेक्षक पाण्यात शिरला होता.अगदी शेवटच्या क्षणी रायनरच्या हातात एका महिलेनं एक वीट दिली होती,काही

क्षणांनी त्या विटेचं महत्त्व कळणार होतं. त्याशिवाय बित्झे मॉल हा चौथा प्रेक्षकही आणीबाणीच्या वेळेस वापरायचा त्याच्या गाडीतला हातोडा घेऊन सर्वांत शेवटी पाण्यात गेला होता.रुबेननं सांगितलं,'आम्ही खिडक्यांवर हातोडा मारू लागलो.'रायनरनं कडेची खिडकी फोडण्याचा प्रयत्न केला;पण ते काही केल्या जमेना.

दरम्यानच्या काळात गाडी वळून इंजिनाच्या बाजूनं खाली गेली.तेव्हा रायनरनं मागच्या खिडकीवर जोरात वीट हाणली,सरतेशेवटी ती खिडकी फुटली.त्यानंतर सगळं काही विजेच्या वेगानं घडलं.आईनं तिचं बाळ मागच्या खिडकीतून माझ्या हातात दिलं.क्षणभर ते मूल अडकलं.'परंतु काही सेकंदांतच रुबेन आणि रायननं बाळाला बाहेर काढलं.रायनर बाळाला घेऊन सुरक्षित जागी गेला;पण आई अजूनही गाडीतच होती.गाडी पाण्यात पूर्णपणे बुडणार एवढ्यात रुबेन,रिंक अणि वित्झे यांनी तिला बाहेर यायला मदत केली.

त्यानंतर दोनपेक्षाही कमी सेकंदांत गाडी कालव्याच्या त्या शाईसारख्या काळ्याशार पाण्यात दिसेनाशी झाली.तोपर्यंत पाण्याच्या बाजूला प्रेक्षकांचा मोठा जमावच गोळा झाला होता.त्यांनी आई,बाळ आणि त्या चार पुरुषांना पाण्यातून बाहेर यायला मदत केली,अंगाभोवती गुंडाळायला टॉवेल दिले.ही सुटकेची कारवाई केवळ दोन मिनिटांतच घडून आली होती.या सगळ्या काळात ते चार अनोळखी पुरुष एकमेकांशी एक शब्दही बोलले नव्हते.त्यांच्यातील एकालाही हालचाल करायला एखाद्या सेकंदाचाही विलंब झाला असता तर मग काहीही उपयोग झाला नसता.त्या चौघांनी पाण्यात उडी मारली नसती तर सुटकेत अपयश येऊ शकलं असतं.त्या निनावी महिलेनं शेवटच्या क्षणी रायनरला वीट दिली नसती तर त्याला गाडीची मागची खिडकी फोडता आली नसती आणि आईला व बाळाला बाहेर काढता आलं नसतं.वेगळ्या शब्दांत सांगायचं तर सॅनी आणि तिचं बाळ पुष्कळ मोठ्या संख्येनं प्रेक्षक असूनही वाचले नव्हते,तर ते प्रेक्षक मोठ्या संख्येनं हजर होते म्हणून वाचले होते.आता तुम्ही विचार कराल की,ही अगदी हृदयस्पर्शी कहाणी आहे;पण मग हा निष्क्रिय बघ्यांच्या नियमाचा अपवाद आहे की डच संस्कृतीतच असं काहीतरी खास होतं किंवा अँमस्टरडॅममधील त्या वस्तीत किंवा अगदी त्या चार माणसांतच काहीतरी खास होतं आणि त्यामुळे हे नियम विसंगत कृत्य घडून आलं?

तर तसं काहीही झालं नव्हतं म्हणजे निष्क्रिय बघ्यांचा नियम अजूनही बऱ्याच शैक्षणिक पुस्तकात शिकवला जात असला तरी २०११ साली प्रकाशित झालेल्या एका तौलनिक विश्लेषणात (मेटा अँनेलिसिस) संकट समयी बघे लोक काय करतात,यावर नव्याने प्रकाश टाकण्यात आला आहे

तौलनिक विश्लेषण म्हणजेच मेटा अँनेलिसिस हे वेगवेगळ्या संशोधनांवर केलेलं संशोधन असतं. त्यात वेगवेगळ्या गटांनी केलेल्या अभ्यासांचा समावेश असतो.संकटकाळातील बघ्यांच्या वर्तनावर मागील ५० वर्षांत महत्त्वाचे असे १०५ अभ्यास करण्यात आले त्या सर्व अभ्यासांचा 'अभ्यास' या तौलनिक विश्लेषणात करण्यात आला होता.त्यात लटाने - डार्ले यांनी केलेल्या (खोलीतील विद्यार्थ्यांच्या) अगदी सुरुवातीच्या प्रयोगाचाही समावेश होता.त्यातून दोन महत्त्वाचे निष्कर्ष निघाले.एक निष्क्रिय बघ्यांचा परिणाम अस्तित्वात असतो. कधी कधी बघे विचार करतात की,संकट समयी आपण मध्ये पडण्याची गरज नाही,कारण दुसऱ्या कुणीतरी ती जबाबदारी घेणं अधिक उपयुक्त ठरेल.कधी कधी त्यांना भीती वाटते की, आपण काहीतरी चुकीचं करून बसू,त्यामुळे टीकेला घाबरून ते पुढे येत नाहीत.तर कधी कधी तिथं काही चुकीचं घडतंय असं त्यांना वाटत नाही.कारण,बाकीचे कुणीच पुढे येऊन कृती करताना दिसत नाहीत.आणि दुसरा निष्कर्ष ? जर संकट जीवावरचं असेल म्हणजे कुणीतरी बुडतंय अथवा कुणावर तरी हल्ला होतोय,अशा वेळेस बघे लोक एकमेकांशी संवाद साधू शकले (म्हणजे ते वेगवेगळ्या खोल्यांत एकेकटे नसले तर ते असण्याचा परिणाम बरोब्बर उलटा होतो.त्या लेखकाने लिहिलं होतं की,'जास्तीच्या संख्येने बघे असले तर कमी मदत मिळण्याऐवजी जास्तच मिळते.' हे तेवढंच नाही.रुबेननं उत्स्फूर्तपणे मदत करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल मी त्याची मुलाखत घेतली,त्यानंतर मी डॅनिश मानसतज्ज्ञ मेरी लिंडगार्ड यांना अँमस्टरडॅममधल्या एका कॅफेत भेटलो. अंगावरील पावसाचे थेंब झटकतच त्या खुर्चीवर बसल्या आणि लॅपटॉप उघडून माझ्यासमोर कागदाचा गठ्ठा टाकून त्यांनी जवळ जवळ व्याख्यानच द्यायला सुरुवात केली.

हे सगळे उफराटे प्रयोग,प्रश्नावल्या भरून घेणं, मुलाखती वगैरे भानगडी का करायच्या असा प्रश्न विचारणाऱ्या पहिल्या संशोधकांत लिंडगार्ड यांचं नाव आहे.त्यांचं म्हणणं होतं की,त्याऐवजी आपण खऱ्या परिस्थितीत सापडलेल्या खऱ्या लोकांचं खरं चित्रीकरणच का नाही बघत? शेवटी काय,आधुनिक शहरांत सगळीकडे कॅमेरे तर लावून ठेवलेले असतातच.'खूपच उत्तम कल्पना! परंतु आपल्याला ते चित्रीकरण मिळणारच नाही.'मेरीला सहकाऱ्यांनी उत्तर दिलं.त्यावर मेरी म्हणाली,'आपण पाहू या ते.' त्यामुळे नंतरच्या काळात मेरीकडे भरपूर माहिती

संग्रह जमला.त्यात कोपनहेगन, केपटाऊन, लंडन आणि अँमस्टरडॅम येथील हजारभर व्हिडिओ होते.त्यात हमरीतुमरीवरील भांडणं,बलात्कार,खुनाचे प्रयत्न अशा प्रकारची चित्रणं होती.त्यांनी काढलेल्या निष्कर्षांतून सामाजिक शास्त्रात एक छोटीशी क्रांतीच घडून आली.त्यांनी माझ्या दिशेनं लॅपटॉप सरकवून म्हटलं, "पाहा, उद्या आम्ही हा लेख एका आघाडीच्या मानसशास्त्रावरील नियतकालिकाकडे पाठवत आहोत.'

मी त्यावरचा कच्चा मथळा वाचला - निष्क्रिय बघ्यांच्या परिणामाबद्दल आपल्याला बरंच काही माहिती आहे,असं जे वाटतं ते सगळं चुकीचं आहे.लिंडगार्डनी कर्सर खाली सरकवला आणि एका सारणीकडे निर्देश केला,

"हे बघा,इथे तुम्हाला दिसेल की,नव्वद टक्के प्रकरणांत लोकांनी एकमेकांना मदत केलेली आहे." नव्वद टक्के.

थांबा अजून गोष्ट पुढे आहे...

६/४/२३

जेव्हा वेळप्रसंग येतो तेव्हा आपण एकाकीच असतो.ही सांगणारी गोष्ट..

१९६१-७०च्या दशकातील ही कहाणी वाचकांना मानवी स्वभावाबद्दलच दुःखद सत्य उघडकीस आणणारी ही कहाणी आहे.आपण 'जे करतो' त्याबद्दल ही कहाणी नसून आपण 'जे करत नाही' त्याची ही कहाणी आहे. दुसऱ्या महायुद्धात लाखो ज्यूंना अटक झाली,त्यांना देशातून हाकलून देण्यात आलं,त्यांची हत्या झाली.

त्याबद्दल जर्मन,डच,फ्रेंच,ऑस्ट्रियन आणि युरोपभरातल्या अन्य लोकांनी स्वतःची बाजू मांडताना केलेल्या दाव्याचे प्रतिध्वनी या कहाणीत ऐकू येतात.ते लोक म्हणाले होते की, विअर हाबेन एस निश्ट गेवूस्ट म्हणजे 'आम्हाला याची काही कल्पनाच नव्हती.' तो दिवस होता १३ मार्च,

१९६४ पहाटेचे सव्वातीन वाजले होते.कॅथरिन सुसान जिनोवेजेने तिची लाल फियाट अंधारातून जेमतेम दिसणाऱ्या 'नो पार्किंग' खांबावरून पुढे नेली आणि ऑस्टिन स्ट्रीटवरील सबवे स्थानकाबाहेर थांबवली.सगळे जण तिला 'किटी' म्हणूनच ओळखायचे.ती उत्साहाचा खळाळता झराच होती.अठ्ठावीस वर्षांच्या किटीला नृत्याचं वेड होतं.'मोकळा वेळ कमी आणि मित्रमैत्रिणी जास्त'

असा तिचा प्रकार होता. किटीला न्यू यॉर्क शहर खूप आवडायचं. तिथे तिला अगदी मनासारखं वागता येई.इथे ती स्वतंत्र होती.त्या रात्री बाहेर फारच थंडी होती आणि मैत्रिणीला भेटायला घरी जायची किटीला कोण घाई झाली होती.त्या एकत्र राहायला लागून आजच एक वर्ष झालं होतं.आणि किटीला मेरी अँनला बिलगून झोपण्याची इच्छा होती.गाडीचे दिवे बंद करून,दरवाजे लॉक करून ती त्यांच्या छोट्याशा घराच्या दिशेनं जाऊ लागली.तिचं घर तिथून १०० पावलांपेक्षाही कमी अंतरावर होतं.परंतु हा आपल्या जीवनातील शेवटचा तास आहे हे किटीला माहिती नव्हतं.

"अगं आई गं,त्याने मला भोसकलं,मला मदत करा.मदत करा मला..'पहाटेचे ३.१९ झाले होते.तिच्या किंकाळ्या रात्रीला चिरत गेल्या.त्या एवढ्या तीव्र होत्या की,

शेजारीपाजारी जागे झाले.बऱ्याच घरांमधले दिवेही लागले.खिडक्या उघडल्या गेल्या,रात्रीच्या अंधारात आवाजांची कुजबुज ऐकू येऊ लागली.कुणीतरी सगळ्यांना सांगितलं,'त्या मुलीकडे लक्ष देऊ नका,सोडा तिला" परंतु किटीचा मारेकरी परतला,त्याने दुसऱ्यांदा तिला चाकू भोसकला,कोपऱ्यासी धडपडत ती पुन्हा ओरडली,"मी मरतेय रे,कुणी तरी या रे" पण कुणीही बाहेर आलं नाही,कुणीही मदत करायला साधं बोटही उचललं नाही.त्याऐवजी डझनभर शेजारी एखादा'रिअँलिटी शो'

टीव्हीवर पाहावा तसे आपापल्या खिडक्यातून पाहत राहिले.एका जोडप्यानं तर खिडकीपाशी बसायला खुच्या आणल्या आणि नीट दिसावं म्हणून दिवेही मंद केले.मारेकरी तिसऱ्यांदा आला तेव्हा ती तिच्या इमारतीच्या जिन्याच्या पायथ्याशी पडलेली होती.वरती मेरी अँन गाढ झोपलेली होती.तिला तर यातलं काही कळलंच नव्हतं.किटीच्या मारेकऱ्याने तिला पुन्हा पुन्हा भोसकलं.पोलीस ठाण्यात पहिला फोन गेला तेव्हा पहाटेचे ३.५० झाले होते.फोन करणाऱ्या शेजाऱ्याने 'आता आपण काय करावं' या विचारमंथनात बराच काळ घालवला होता.दोन मिनिटांत पोलीस अधिकारी तिथे पोहोचले; परंतु तोवर खूप उशीर झाला होता.त्या फोन करणाऱ्याने पोलिसांना सांगितलं,"मला या भानगडीत पडायचं नव्हतं."

'मला या भानगडीत पडायचं नव्हतं,हे

ते पाच शब्द सगळ्या जगभरात घुमले.

सुरुवातीला किटीचा 'खून' हा न्यू यॉर्क शहरात त्या वर्षी घडलेल्या ६३६ खुनांपैकी एक होता. एक जीवनज्योत अकाली विझली,एक प्रेम अकाली अस्तंगत हरपलं आणि शहर आपण त्या 'गावचं'च नसल्यासारखं पुढे चालू लागलं;परंतु दोन आठवड्यांनी ती गोष्ट पेपरात छापून आलीच आणि थोड्याच काळात किटीची हत्या इतिहासाच्या पुस्तकांतही समाविष्ट झाली.

ती कहाणी समाविष्ट होण्याचं कारण तो मारेकरी किंवा बळी पडलेली किटी हे नव्हते तर हा खून नुसतं बघत राहणारे बघे होते.


(ह्युमनकाइंड - रूट्गर ब्रेगमन,अनुवाद - सविता दामले,मजुंल पब्लिशिंग हाऊस)


२७ मार्च,१९६४,गुड फ्रायडे या दिवशी प्रसारमाध्यमातील वादळ सुरू झालं.न्यू यॉर्क टाइम्समध्ये पहिल्या पानावर बातमी आली,'खून पाहणाऱ्यांनी पोलिसांना बोलावलं नाही.'त्या लेखाची सुरुवातच अशी होती की,'क्यू गार्डन येथे एका मारेकऱ्याने एका तरुणीला थोड्या थोड्या अंतराने तीनदा येऊन भोसकलं;परंतु क्वीन्स परिसरातील प्रतिष्ठित,कायदेपालन करणारे ३८ नागरिक अर्ध्या तासाहूनही अधिक काळ ते दृश्य नुसतेच बघत राहिले.त्या बातमीत पुढे लिहिलं होतं,'एका गुप्तहेराच्या म्हणण्यानुसार केवळ एक फोन त्यांनी केला असता तर किटी आज जिवंत असती.ग्रेट ब्रिटन ते रशिया आणि जपान ते इराण - सर्वत्र किटी बातमीचा विषय बनली.'सोव्हिएत वृत्तपत्र 'इझवेस्तियाने लिहिलं की,'भांडवलवादाच्या जंगलनीतीचा हा पुरावाच आहे.ब्रुकलिनमधील एका धर्मोपदेशकानं म्हटलं की,'येशूला सुळावर देणाऱ्या समाजाइतकाच अमेरिकन समाजही विकृत बनला आहे.तर एका सदरलेखकाने आपल्या सदरातून देशबांधवांचा धिक्कार करत लिहिल की,ते दुसऱ्याच्या भावनांची कदर न करणारे,भ्याड आणि अनीतिमान लोक आहेत.किटी राहत होती त्या क्यू गार्डन परिसरात पत्रकार,छायाचित्रकार आणि टीव्हीच्या ताफ्याने एकच गर्दी केली.हा परिसर खूप चांगला, व्यवस्थित,

प्रतिष्ठित शेजाऱ्यापाजाऱ्यांचा आहे, यावर त्यांचा विश्वासही बसत नव्हता.कारण,तसं जर होतं तर या परिसरातले रहिवासी एवढी अंगावर काटा आणणारी बेपर्वा वृत्ती कशी काय दाखवू शकले होते?कुणीतरी दावा केला की, टेलिव्हिजनने सगळ्यांच्या संवेदना बधिर करून टाकल्या,तर दुसरा म्हणाला की,'नाही,या स्त्रीवादाने पुरुषांचं रूपांतर नामर्दात करून टाकलं आहे'.आणखी काहींना वाटलं की,'मोठ्या शहरात कुणीच कुणाला ओळखत नसल्याचा हा परिणाम आहे'.होलोकॉस्ट झाल्यावर जर्मन लोक बोलले होते,त्याची आठवणच हा प्रसंग करून देत होता का? कारण त्यांनीही आपल्याला काहीही माहिती नसल्याचा दावा केला होता.आम्हाला कल्पनाच नव्हती काही असं म्हणाले होते ते.न्यू यॉर्क टाइम्सचे महानगरीय संपादक एब रोझेन्थाल यांनी केलेलं विश्लेषण खूप लोकांना पटलं.एब हा त्या काळातला आघाडीचा पत्रकार होता.त्याने लिहिलं,'ऑस्टिन स्ट्रीटवरील इमारतींमध्ये आणि घरांमध्ये जे काही घडलं त्यातून मानवी परिस्थितीचं एक भयानक वास्तवच नजरेसमोर आलं.'


जेव्हा वेळप्रसंग येतो तेव्हा आपण एकाकीच असतो.


थांबा अजून गोष्ट पुढे आहे.ती पुढील लेखामध्ये..

४/४/२३

भगवद्गीता - व्यास (इसपू चौथं ते पाचवं शतक)

'व्यासोच्छिष्टं जगत्सर्वम्' म्हणजेच व्यासांनी जगातलं सगळं ज्ञान उष्टं करून सोडलं आहे (म्हणजे,जगात असा कोणताही विषय नसेल, ज्याला महर्षी व्यासांनी त्यांच्या लेखनात स्पर्श केला नाही),असा समज सर्वत्र आहे.कारण,भगवद्गीतेमध्ये किंवा महाभारतामध्ये मानवी जीवनातल्या नीतिशास्त्र,

व्यवहारशास्त्र आणि मानसशास्त्र या विषयांचं सखोल विवेचन केलं आहे.अनेक धर्मांतल्या तत्त्वज्ञांनी,विचारवंतांनी आणि शास्त्रज्ञांनी

भगवद्गीतेची प्रशंसा केली आहे.महात्मा गांधींपासून अल्बर्ट आईन्स्टाईनपर्यंत अनेक थोरांना भगवद्गीतेनं प्रभावित करून सोडलं आहे.

"जेव्हा जेव्हा मनात शंकांचं काहूर माजतं आणि समोर फक्त नैराश्य दिसतं;दूर क्षितिजापर्यंत आशेचा एकही किरण दिसत नाही,अशा वेळी भगवद्गीतेमधल्या एका श्लोकाचा आधार मला मिळतो आणि त्या परिस्थितीतही माझ्या चेहऱ्यावर हासू फुलतं.भगवद्गीतेचं ध्यान केल्यानं आयुष्यात रोज नवा आनंद आणि नवा अर्थ प्राप्त होतो,"

असं म्हटलंय महात्मा गांधी यांनी!फक्त हिंदूंचाच नव्हे तर ओडिसी, इलियाडसारख्या ग्रीक महाकाव्याइतकाच महत्त्वाच्या आणि मानवी इतिहासातल्या महत्त्वाच्या ग्रंथांपैकी एक प्राचीन ग्रंथ म्हणून भगवद्गीता ओळखली जाते.म्हणूनच न्यायालयात भारतामधल्या भगवद्गीतेवर हात ठेवून शपथ घ्यायला लावलं जातं आणि मगच आरोपी असेल,साक्षीदार असेल किंवा फिर्यादी असेल ते आपलं म्हणणं मांडतात.या पवित्र ग्रंथावर हात ठेवल्यावर तो सत्यच कथन करेल,असा एक विश्वास बाळगला जातो.'गीतोपनिषद' किंवा 'योगोपनिषद' या नावांनी म्हणजेच वेदांच्या शेवटच्या रचनेतला भगवद्गीता एक ग्रंथ मानला जातो.भगवद्गीतेला उपनिषदाचा दर्जा दिला गेला आहे. तत्त्वज्ञानावर आधारलेला हा ग्रंथ आहे.गीता म्हणजे प्रत्यक्ष परमेश्वरानं म्हणजेच श्रीकृष्णानं (श्रीकृष्ण म्हणजेच विष्णूचं रूप असं मानलं जातं.) युद्धाच्या वेळी अर्जुनाला आयुष्यात येणाऱ्या वेगवेगळ्या प्रसंगांत कसं वागावं याबद्दल सांगितलं आहे.मूळ संस्कृत 'भाषेमध्ये असलेल्या भगवद्गीतेमध्ये एकूण १८ अध्याय असून ७०० श्लोक आहेत.भगवद्गीतेची निर्मिती ख्रिस्तजन्माच्या आधी काही शतकं झाली असावी असं मानण्यात येतं.मात्र याबद्दल तज्ज्ञांमध्ये एकवाक्यता नाही.तसंच भगवद्गीता ही महाभारतात असल्यानं ती व्यास ऋषींनी लिहिली असावी असं मानण्यात येतं.काही अभ्यासकांच्या मते भगवद्गीता ही मूळ महाभारतात नव्हतीच,तर ती महाभारतात नंतर समाविष्ट करण्यात आली असावी.अशी अनेक मतमतांतरं असली तरी भारतामध्ये पूर्वीपासून अनेक विषयांवरचं ज्ञान हे मौखिक स्वरूपात एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जात असल्यानं भगवद्गीतेची प्राचीनता कोणीही नाकारत नाही.भगवद्गीतेमधलं तत्त्वज्ञान हे कालातीत असल्याचंही मानण्यात येतं.याचं कारण कुठल्याही काळात यातलं तत्त्वज्ञान मानवी जीवनाला लागू पडतं.असं म्हणतात,सुमारे ५००० वर्षांपूर्वी श्रीकृष्णाने आपला शिष्य अर्जुन हा युद्धभूमीवर संभ्रमावस्थेत असताना त्याच्याशी साधलेला संवाद म्हणजे भगवद्गीता आहे.अर्थात है समजून घेण्यासाठी आधी आपल्याला एक गोष्ट जाणून घ्यावी लागेल.कुरुक्षेत्रात जन्म झालेले भरत वंशातले धृतराष्ट्र आणि पांडू है दोन भाऊ होते.धृतराष्ट्र हा जन्मापासूनच अंध असल्यानं तो मोठा असूनही राज्यपद हे लहान असलेल्या पांडूला मिळालं होतं.पांडूला पाच मुलं,तर धृतराष्ट्राला १०० मुलं होती.पांडूची मुलं पांडव म्हणून,तर धृतराष्ट्राची मुलं कौरव म्हणून ओळखली जात होती.तरुण वयातच पांडूचा मृत्यू झाल्यामुळे युधिष्ठिर,भीम,अर्जुन,नकुल आणि सहदेव या पांडूच्या पाच मुलांचं संगोपन काही काळ राजपदावर बसलेल्या धृतराष्ट्राने केलं.कौरव आणि पांडव यांना गुरू द्रोणाचार्य यांनी क्षत्रिय विद्येत प्रवीण केलं.आपण वयानं ज्येष्ठ असल्यामुळे आता आपल्याच मुलांना राजपदावर बसण्याचा अधिकार असला पाहिजे असं धृतराष्ट्राला वाटत होतं.त्यातच धृतराष्ट्राचा मोठा मुलगा.दुर्योधन हा पांडवांचा द्वेष करत असे.त्यानं धृतराष्ट्राच्या मदतीने पांडवांना ठार मारून राज्य बळकावण्याचं ठरवलं.या कामात त्याला त्याचा मामा शकुनी याची नेहमीच साथ मिळत असे.मात्र पांडवांना त्यांचा काका विदुर आणि त्यांचा मामेभाऊ श्रीकृष्ण यांनी वाचवलं. विदुर आणि श्रीकृष्ण पांडवांचं वेळोवेळी रक्षण करत असले,तरी कौरव कट-कपट करण्यात कमी नव्हते.त्यांनी पांडवांना एकदा द्यूत हा खेळ खेळण्याचं आव्हान दिलं.या खेळात पांडव एक एक गोष्ट हरत गेले.अखेर त्यांच्याजवळ लावण्यासाठी काहीही शिल्लक राहिलं नाही.अशा वेळी त्यांनी आपली पत्नी द्रौपदी हिला खेळात उभं केलं.या वेळी श्रीकृष्णानं द्रौपदीचं रक्षण केलं;पण पांडव या खेळात आपलं राज्य गमावून बसले आणि त्यांना १३ वर्ष वनवास भोगण्याची शिक्षा मिळाली.१३ वर्षांच्या वनवासानंतर परत आल्यावर पांडवांनी दुर्योधनाकडे आपलं राज्य परत मागितलं, तेव्हा दुर्योधनानं सपशेल नकार दिला.इतकंच नाही तर सुईच्या टोकावर मावेल इतकी भूमीसुद्धा मी देणार नाही,असं उर्मटपणे उत्तर त्यानं पांडवांना दिलं.खरं तर आत्तापर्यंत वेळोवेळी पांडवांनी नेहमीच समंजसपणाची भूमिका घेतली होती; पण क्षत्रिय असल्यानं राज्य करणं हा आपला धर्म असून आता आपण युद्ध करायलाच हवं हे त्यांच्या लक्षात आलं.

युद्धाचा निर्णय होण्याआधी श्रीकृष्णानं मध्यस्थाची भूमिका बजावत दुर्योधनाला समजावण्याचा प्रयत्न केला;पण दुर्योधनानं काहीही ऐकायला नकार दिला आणि शेवटी युद्ध होणार हे नक्की झालं.या युद्धात श्रीकृष्ण हा पांडवांच्या बाजूनं उभा राहिला. त्यानंच अर्जुनाच्या रथाचं सारथ्यही केलं.या युद्धामध्ये अर्जुनाची मन:स्थिती खूपच द्विधा झालेली होती.आपण आपल्याच भावांशी, स्नेह्यांशी लढणार या गोष्टीचं त्याला खूप वाईट वाटत होतं.युद्धभूमीवर धारातीर्थी पडलेले आपल्याच माणसांचे मृतदेह पाहण्यापेक्षा आपण युद्धात माघार घेतलेली बरी,असे विचार त्याच्या मनात डोकावायला लागले.अशा वेळी अर्जुनाच्या मनात आलेले प्रश्न आणि त्यांना श्रीकृष्णाने दिलेली उत्तर आणि त्याला करून दिलेली कर्तव्याची जाणीव म्हणजेच भगवद्गीता आहे.कुठल्या परिस्थितीत कसं वागायला हवं याचं मार्गदर्शन श्रीकृष्ण अर्जुनाला करतो.श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्यामध्ये झालेल्या संवादात आयुष्याचं तत्त्वज्ञान आहे. ज्ञान आहे आणि माहिती आहे. तसंच वेगवेगळ्या प्रसंगांतली उदाहरणं आहेत आणि अनेकविध उपमाही आहेत.मनुष्याला योग आणि वेदान्त याविषयीचं मार्गदर्शन यात केलं आहे. तसंच अशा प्रकारे वागल्यास माणसाचं आयुष्य सुखाने व्यतीत करता येऊ शकतं हेही या ग्रंथात सांगितलं आहे.'भगवद्गीता' या ग्रंथामुळे माणसाला ज्ञान मिळतं,समाधान मिळतं आणि अखेर आनंदही मिळतो.

अखेर त्याला आयुष्य सुखकर करून मोक्षाचा मार्ग शोधायला मदत होते,असं मानण्यात आल्यामुळे या ग्रंथाला 'मोक्षशास्त्र' असंही म्हटलं गेलं आहे.भारतीय संस्कृतीत रामायण आणि महाभारत ही दोन पर्व अतिशय महत्त्वाची मानली जातात. त्यातल्या महाभारत या पर्वामध्ये भीष्मपर्वात भगवद्गीतेविषयी सांगण्यात आलं आहे. महाभारतातल्या २५ ते ४२ अध्यायांमध्ये भगवद्गीतेविषयी सांगण्यात आलं आहे.संस्कृत भाषेत असलेला हा मूळ ग्रंथ इतक्या ओघवत्या आणि छंदात्मक भाषेत लिहिला गेला आहे,की वाचताना त्या श्लोकांना आपोआपच एक लय आणि एक नाद प्राप्त झाल्यामुळेच भारतात अनेक ठिकाणी भगवद्गीता गायलीही जाते.भगवद्गीतेतल्या जे अठरा अध्यायाची नावं अर्जुनविषादयोग,सांख्ययोग,

कर्मयोग, ज्ञानसंन्यासयोग,कर्मसंन्यासयोग,

आत्मसंयमयोग,ज्ञानविज्ञानयोग,अक्षरब्रह्मयोग,

राजविद्याराजगुह्ययोग, विभूतियोग,विश्वरूप-दर्शनयोग,भक्तियोग,क्षेत्रक्षेज्ञविभागयोग,गुणत्रयविभागयोग, पुरुषोत्तमयोग,दैवासुर संपविभागयोग, श्रद्धात्रयविभागयोग आणि मोक्षसंन्यासयोग अशी आहेत.भगवद्गीतेतल्या १८ अध्यायांना ज्याप्रमाणे १८ नावं आहेत,त्याचप्रमाणे गीतेलाही १८ नावांनी संबोधलं जातं.गीता,गंगा,गायत्री,सीता,सत्या,

सरस्वती,ब्रह्मविद्या,ब्रह्मवल्ली,त्रिसंध्या,मुक्तगेहिनी,अर्धमात्रा,चिदानंदा,भवग्नी,भय नाशिनी,वेदत्रयी,परा,

अनंता आणि तत्त्वार्थ ज्ञानमंजिरी अशी ती नावं आहेत.रोज जर या १८ नावांचं स्मरण केलं तर माणसाला पुण्य लाभतं,असाही एक समज हिंदुधर्मात प्रचलित आहे.भगवद्गीतेमध्ये एकूण ६० विषयांवर बोललं गेलंय.परमेश्वराची भक्ती, त्या भक्तीचे प्रकार,परमेश्वराचं स्मरण केल्यानं मिळणारे फायदे,माणसानं कुठल्या प्रकारे कर्म केलं पाहिजे,परमेश्वराला शरण जाणं,स्वतःचं प्रबोधन,शत्रूवर विजय मिळवणं,योगाभ्यास, समाधीभ्यास,परमेश्वराची प्रशंसा,संसार,नरक कसा टाळावा,आहार कसा असावा,साधना कशी करावी,

लोकसंग्रह कसा करावा किंवा असावा, मोहाचा त्याग कसा करावा,ज्ञानप्राप्ती कशी करावी,स्वधर्मपालन कसं करावं,स्थितप्रज्ञता अंगी कशी बाणवावी अशा प्रकारचे विषय यात मोडतात.भगवद्गीतेच्या १८ अध्यायांपैकी पहिल्या अध्यायामध्ये काय आहे? कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर अर्जुन आपल्या रथासह दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी उभा असून त्याला त्या युद्धाचे भयंकर परिणाम डोळ्यासमोर दिसत होते आणि अशा वेळी आपण आपल्याच माणसांना मारून युद्ध जिंकून काय मिळवणार आहोत,असा प्रश्न पडला आणि मनोधैर्य खचल्यानं तो युद्ध करायला नकार देतो.दुसऱ्या अध्यायात श्रीकृष्ण अर्जुनाची कानउघाडणी करतो.

अनेक तज्ज्ञांच्या मते दुसऱ्या अध्यायात भगवद्गीतेचा खरा सार आहे.

वासांसि जीर्णानि यथा विहाय ।

नवानि गृह् णाति नरोऽपराणि।

तथा शरीराणि विहाय जीर्णा 

न्यन्यानि संयाति नवानि देही ॥२२॥ 

यात युद्धानं मरण पावलेल्यांविषयी अर्जुन

विचार करताना श्रीकृष्ण त्याला म्हणतो, की मृत्यू म्हणजे दुसरं काही नसून मनुष्य आपली जीर्ण किंवा जुनी वस्त्रं टाकून नवी वस्त्रं धारण करतो,म्हणजेच नवा जन्म घेतो.त्यामुळे तू दुःखी होऊ नकोस.तसंच यात महत्त्वाचा श्लोक आहे तो म्हणजे :

कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन। 

मा कर्मफलहेतुर्भूर्मा ते संगो €

 स्त्वकर्मणि ॥४७॥

मनुष्यानं आपलं काम करत राहिलं पाहिजे.मात्र काम करत असताना त्याचं फळ मिळेल,ही अपेक्षा ठेवून काम करू नये.माणूस आपल्या इच्छा आणि वासना सोडतो,

तेव्हा तो खरा समाधानी होतो.आयुष्य जगताना अकर्म,कर्म आणि विकर्म असे तीन प्रकार असून कर्म म्हणजे मनुष्य करत असलेली कृती,तर फळाची अपेक्षा न करता केलेली कृती म्हणजे अकर्म आणि हिंसक,भयंकर अशी कृती म्हणजे विकर्म, असं श्रीकृष्णानं सांगितलं आहे.या जगात ज्ञानासारखं दुसरं महत्त्वाचं काही नाही.

ज्ञानी पुरुषाची समदृष्टी असते.म्हणजेच तो सगळ्यांकडे

सारख्याच दृष्टीनं बघतो.आपल्या इंद्रियांवर नियंत्रण कसं मिळवावं याविषयी योगाबद्दलची विस्तृत माहितीदेखील भगद्गीतेत सांगितली आहे.अभ्यासापेक्षा ज्ञान गहन असून ज्ञानापेक्षा ध्यान श्रेष्ठ आहे आणि ध्यानापेक्षा कृती करून मिळणाऱ्या फळाचा त्याग जास्त श्रेष्ठ असून,कर्मफलत्याग यापेक्षाही शांती ही श्रेष्ठ असते,असं भगवद्गीता सांगते.

विशेष म्हणजे यात सजीव सृष्टीच्या निर्मितीबद्दलही श्रीकृष्णानं सांगितलं आहे.रजो तमो-सत्त्वगुणांविषयी सखोल माहिती यात आहे.माणसाच्या वृत्ती त्याला माणूस म्हणून आणि राक्षस म्हणून कशा घडवतात याविषयी गीता बोलते.काम,क्रोध आणि लोभ ही विनाशाकडे जाणारी लक्षणं असून माणसानं या तिन्ही गोष्टींपासून दूर राहायला हवं.भगवद्गीतेमधला १८ वा अध्याय खूप महत्त्वाचा असून त्यात आयुष्य जगताना माणूस दोन मार्ग निवडू शकतो आणि मोक्ष प्राप्त करू शकतो,असं म्हटलं आहे.पहिला मार्ग म्हणजे सांख्य मार्ग याचाच अर्थ संन्यासी होऊन चालण्याचा मार्ग आणि दुसरा मार्ग म्हणजे कर्मयोगाचा,श्रीकृष्ण कर्मयोगाचा मार्ग जास्त चांगला,असं म्हणतो.फक्त कर्म करताना तटस्थ बुद्धी,फळाची इच्छा न धरता मार्गक्रमण, इंद्रियांवरचा निग्रह किंवा नियंत्रण,

परमेश्वर आणि भक्ती,स्वधर्माला जाणणं,अशा अनेक गोष्टींबद्दल बोललं गेलंय.एकूणच मानवी जीवन जगताना ते अर्थपूर्ण,समाधानी आणि समृद्ध होण्याच्या पायऱ्या भगवद्गीता सांगते.खरं तर भगवद्गीता म्हणजे आयुष्य समृद्ध करण्यासाठी चढायची एक एक पायरी आहे. भगवद्गीतेच्या अध्ययनामुळे आत्मपरीक्षण,संयम,

ध्यान,योग, दया यांचं ज्ञान प्राप्त होतं.अनेक प्रसंगांत माणसाचं मन द्विधा होतं आणि मनात कोलाहल माजतो.

अशा वेळी काय करावं हे त्याला सुचत नाही.अशा वेळी गीतेच्या पठणानं त्याचं मन शांत होतं.भगवद्गीतेमध्ये चातुर्वर्ण्य-देखील मांडला आहे.त्यामुळे त्यावर वेळोवेळी टीकाही झाली आहे.माणसाला भगवद्गीता सत्य आणि सदाचार यांचा मार्ग दाखवते.भगवद्गीतेनं सांगितलेल्या मार्गावरून जो चालेल त्याच आयुष्य उजळून निघेल असं मानलं जातं.भगवद्गीतेची शिकवण जो आचरणात आणल त्याचं जीवन सुखकर तर होतंच,पण भगवद्गीतेची सगळ्यात महत्त्वाची शिकवण म्हणजे आपण कुठलीही अपेक्षा न करता आपलं काम आणि कर्तव्य करत पुढे जाणं होय.थोडक्यात,भगवद्गीतेची ही शिकवण माणसाला निःस्वार्थीपणाचे धडे देते. निःस्वार्थीपणा ही आध्यात्मिक उन्नतीची पहिली पायरी समजली जाते.कठीण प्रसंगात परिस्थितीला सामोरं जाण्याचं धैर्य,संकटांशी दोन हात करण्याचं सामर्थ्य ती देते.तसंच आयुष्याकडे बघण्याची समतोल दृष्टीही भगवद्गीताच देते.आपल्या राग,लोभ,

संताप या भावनांना काबूत ठेवण्याची ताकद मनुष्याला तीच देते.माणसाला विवेकशील बनवण्याचं सामर्थ्य भगवद्गीतेमध्ये आहे.मनातले नकारात्मक विचार घालवून सकारात्मक विचारांची ज्योत तेवायला तीच मदत करते.

ज्याप्रमाणे मनुष्य आपली जुनी वस्त्रे टाकून नवीन वस्त्रे धारण करतो त्याचप्रमाणे मृत्यू म्हणजे मनुष्य आपलं वृद्धावस्थेमुळे जीर्ण झालेलं शरीर त्यागून नवीन शरीर धारण करतो, असं भगवद्गीता सांगते.त्यामुळे माणसानं मृत्यूला घाबरू नये आणि शोक करू नये असे यातून ती सूचित करते आत्मा असून त्याला कोणीही नष्ट करू शकत नाही,असे भगवद्गीतेमध्ये सांगितले आहे.तसंच जन्म आणि मृत्यू हे अटळ असून त्यांचं दुःख करू नये,काम क्रोध आणि लोभ या तीन गोष्टी मनुष्याला नरकाकडे नेतात त्यामुळे माणसाने या तिन्हींचा त्याग केला पाहिजे असं भगवद्गीता सांगते.भगवद्गीता फक्त वाचायचाच ग्रंथ नाही,तर तो सांगितला जातो आणि एकलाही जातो आणि मुख्य म्हणजे तो आचरणात आणण्याचे प्रयत्न केले जातात.


अपुर्ण..

जग बदलणारे ग्रंथ


२/४/२३

झाडांच्या अबोल विश्वाचं बोलकं दर्शन - झाडांची भाषा..

डिक्शनरीप्रमाणे भाषेची व्याख्या करायची झाल्यास,

एकमेकांशी संवाद साधताना आपण जे साधन वापरतो ते म्हणजे भाषा.या दृष्टिकोनातून विचार केला तर पृथ्वीच्या सजीव सृष्टीत फक्त मानव जातीतच भाषेचा वापर होतो असे म्हणावे लागेल,कारण या संकल्पनेची व्याप्ती मानवकेंद्रित आहे.पण जंगलातून झाडांचं एकमेकांशी संभाषण चालत असेल का,हे जाणून घेणं रोचक ठरणार नाही का?पण ते एकमेकांशी संवाद तरी कसा करत असतील? झाडं काही आवाज काढत नाहीत,वाऱ्याने

एकमेकांवर घासून फांद्यांची करकर आणि पानांची सळसळ ऐकू येते,मात्र त्यात झाडाला काही श्रेय नाही.असं लक्षात आलंय की झाडं एका निराळ्याच पद्धतीने एकमेकांशी संवाद साधतात.त्यासाठी ते गंधाचा वापर करतात.गंधाच्या वापरातून संभाषण' हे कसं शक्य आहे? अहो,ही गोष्ट काही आपल्याला अगदीच अनोळखी नाही.नाहीतर आपण अत्तर आणि सुगंधाचा वापर कशाला केला असता?आणि अत्तर वापरलं नाही तरीही आपला गंध कळत नकळत दुसऱ्यांना काहीतरी सांगून जात असतोच की! काही लोकांना वास येतच नाही.तरीही आपण दुसऱ्याच्या गंधाकडे आपोआप आकर्षित होत असतो.आपल्या घामातील'फेरोमोन्स' या रसायनामुळे प्रत्येक व्यक्तीला एक विशिष्ट गंध असतो आणि हे 'फेरोमोन्स'च आपल्या जोडीदाराच्या निवडीत आपल्याला निर्णायक मदत करतात.थोडक्यात,

आपल्या वंशवाढीसाठी कुणाला निवडावे,हे ठरवण्यात 'फेरोमोन्स'ची भूमिका महत्त्वाची आहे.

म्हणजे गंधाची गुप्त भाषा मानवालाही कळते असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही.चार दशकांपूर्वी आफ्रिकन सव्हानामध्ये शास्त्रज्ञांना एक शोध लागला.काही जिराफ अम्ब्रेला थॉर्न अकेशिया (बाभूळ) झाडांची पालवी खात होते,जे साहाजिकच त्या झाडांना पसंत नव्हतं.काही क्षणातच त्या झाडांनी आपल्या पानांमध्ये विषारी द्रव्य सोडायला सुरुवात केली.आपण इथे नकोसे आहोत असा संदेश त्या जिराफांना मिळाला आणि ते निघून गेले.पण ते शेजारच्या झाडाकडे वळले का? नाही! सुमारे शंभर यार्ड दूर जाऊन त्यांनी परत आपली खादाडी सुरू केली.याचं कारण फारच आश्चर्यकारक आहे.ज्या झाडांवर जिराफांचा फराळ चालू होता त्या झाडांनी हवेत इथिलिन नावाचा एक गॅस सोडला.यामुळे आजूबाजूच्या झाडांना काहीतरी संकट असल्याचा संदेश मिळाला.मग तेही आपल्या पानातून विषारी रसायन सोडायला लागले.जिराफही हुशार होते ते सव्हानाच्या अशा भागात गेले जिथे संदेश पोहोचला नसेल किंवा वाऱ्याच्या उलट्या दिशेला चालू लागले.इतरांना खबर पोचवणारा वायू वाऱ्याबरोबर वाहत जातो आणि उलट्या दिशेच्या झाडांना जिराफ येत असल्याची सूचना मिळालेली नसते.फक्त आफ्रिकेतच नव्हे तर आपल्या भागातील जंगलातही अशा प्रकारचा संवाद चालू असतो. आपल्या पालवीची चराई होत असताना झाडाला ज्या वेदना होतात त्याची नोंद बीच,स्प्रूस आणि ओक प्रजातीची झाडंही ठेवतात.जेव्हा एखादा सुरवंट पान खायला सुरुवात करतो तेव्हा जखमेच्या भोवतालच्या ऊतीमध्ये बदल होतो. त्या ऊती काही विद्युत संदेश सोडतात.जखम झालेल्या मानवी ऊतीमध्येही हेच दिसतं.आपल्या मेंदूला असा संदेश काही मिली-

सेकंदात पोहोचतो,पण वनस्पतीत त्याचा प्रवास मिनिटाला एक तृतीयांश इंच इतका संथ असतो.

त्यामुळे संरक्षण रसायनांचे काम सुरू होईपर्यंत काही तास जातात.वनस्पतींचे जीवनचक्र संकटसमयीसुद्धा असेच संथ गतीने चालते.पण याचा अर्थ असा नव्हे की झाडांचे आपल्या अवयवात काय चालू आहे.

यावर नियंत्रण नाहीं.मुळांवर काही संकट बेतलं तर पूर्ण झाडाला ते कळतं आणि पानातून गंधित सुरक्षा द्रव्यं सोडली जातात.या द्रव्यांचा साठा केला जात नाही,ती त्याक्षणी लाईफ आणि त्या कामासाठी बनवली जातात.झाडात अशी वेगवेगळी द्रव्यं बनवण्याची क्षमता असते त्यामुळे काही क्षण तरी त्यांना स्वतःवरच्या हल्ल्यापासून रक्षण करता येतं.झाडांना आपले मित्र कीटक आणि शत्रू कीटकांची अचूक ओळख असते.प्रत्येक कीटकाची लाळ वेगळी असते,त्यावरून झाडाला कीटक ओळखता येतो.झाडांकडून कीटकांना ओळखण्याची प्रक्रिया इतकी अचूक असते की झाड त्यानंतर अशी 'फेरोमोन्स' हवेत सोडतात जी त्या विशिष्ट कीटकांना खाणाऱ्या विशिष्ट भक्षकांनाच आकर्षित करतात.ते उपकारक भक्षक मग या त्रासदायक कीटकांना खाऊन टाकतात आणि झाडांची मदत करतात. उदाहरणार्थ,एल्म आणि पाईनच्या झाडांकडून एका परोपजीवी माशीला आमंत्रण दिलं जातं. ती माशी झाडावर येऊन पान खाणाऱ्या सुरवंटामध्ये आपली अंडी घालते.माशीची पिल्लं मोठी झाली की सुरवंटाला आतून खायला ते सुरुवात करतात मरण पावण्याची ही नक्कीच आल्हाददायी पद्धत नाही! पण याचा परिणाम म्हणजे त्या कीटकांपासून झाडाची सुरक्षा होते आणि वाढ होत राहते.झाडांना कीटकांची लाळ ओळखता येते म्हणजे त्यांच्यात अजून एक क्षमता आहे,ती म्हणजे चवीची पारख.गंधाची एक मर्यादा म्हणजे वाऱ्याने तो लगेच उडून जातो आणि फार फार तर शंभर एक यार्डाच्या परिसरातच दरवळतो.पण वास झपाट्याने पसरतो त्यामुळे या मार्गाने संकटाचा इशारा आपल्या इतर भागांना तत्काळ पोचवता येतो.एखाद्या कीटकाचा इशारा देण्यासाठी झाडाला विशिष्ट सूचना देण्याची गरज नसते. झाडांनी सोडलेला मूलभूत रासायनिक इशारा प्राणी जगताला ओळखू येतोच आणि त्यांना कळतं की झाडावर हल्ला झाला आहे.भुकेल्या कीटक- भक्षकांना खाद्यापासून दूर राहणे अशक्य असते.मग त्यांची मेजवानीच झडते.झाडं स्वत:ची सुरक्षा स्वत: ही करू शकतात. उदाहरणार्थ,ओक प्रजातीच्या झाडांच्या पानांत आणि सालात कडू विषारी टॅनिन द्रव्य असतं.हे खाऊन काही कीटक मरतात तर काहींना त्याची कडू चव सहन होत नाही.

विलो वृक्षात अशाच प्रकारचं सालिसिलिक अँसिडचं उत्पादन होतं. आपण या अँसिडचा वापर अँस्प्रिन औषधात करतो त्यामुळे विलो झाडाच्या सालापासून बनवलेला चहा आपल्याला डोकेदुखीसाठी आणि तापावर उपयुक्त असतो. पण अशा प्रकारची सुरक्षाप्रणाली राबवण्यात झाडाला खूप वेळ लागतो.त्यामुळे स्वसुरक्षेसाठी झाडांना रासायनिक द्रव्यं आणि गंध यांचा दुहेरी वापर करावा लागतो.

संकटसमयी झाड फक्त गंधाचा वापर करून गप्प बसत नाही,कारण जिकडे वारं पोहोचणार नाही तिथले आपले काही बांधव त्यापासून वंचित राहतील.बॅनकुवर येथील युनिव्हर्सिटी ऑफ ब्रिटिश कोलंबियाच्या सुसन सीमार्ड यांनी असा शोध लावला की एकमेकांना धोक्याची सूचना देण्यासाठी झाडं आपल्या मुळाला जखडलेल्या बुरशीच्या जाळ्यातून (फंगल नेटवर्क) रासायनिक संदेश पाठवू शकतात.'आणि आश्चर्य म्हणजे मुळातून फक्त रसायनाद्वारे बातम्या दिल्या जात नाहीत तर त्यासाठी झाडांकडून इलेक्ट्रिक इम्पल्स म्हणजे विद्युत लहरींचा वापरही होतो.यांचा वेग सेकंदाला एक तृतीयांश इंच इतका असतो.आपल्या शरीराच्या मानाने हा वेग खूपच मंद म्हणायला हवा.पण जेलीफिश आणि काही अळ्यांच्या मज्जातंतूंतून धावणाऱ्या संदेशाचा असाच वेग असतो.

एकदा का अशा ताज्या बातम्या प्रसारित झाल्या की लगेच इतर ओक संरक्षणासाठी त्याच्या धमन्यांतून टॅनिन सोडू लागतात.झाडांच्या मुळांचा विस्तार त्यांच्या पानांच्या विस्तारापेक्षा दुप्पट तरी असतो. त्यामुळे आपल्या शेजारच्या झाडाच्या मुळांना त्यांना नक्कीच जोडून घेता येतं.तरीही त्यात काही अपवाद आहेत.

जंगलात काही एकलकोंडे वृक्ष असतात ज्यांना इतरांशी संबंध ठेवायचा नसतो.अशा झाडांचा परिसंस्थेत सहभाग नसल्याने त्यांच्याकडून संकट सूचना अडवल्या जातात का? सुदैवाने याचे उत्तर नाही असं आहे.संदेश पोचवण्याच्या कामात बुरशी मध्यस्थाचं काम करतात. इंटरनेटच्या फायबर ऑप्टिक तारेप्रमाणे बुरशी काम करतात.बुरशीचे सूक्ष्म तंतू जमिनीत सर्वत्र पसरून त्यांचं एक घनदाट जाळं तयार झालेलं असतं.जंगलातून एक चमचा माती घेतली तर काही मैल तंतू त्यात असतात.'हायफी'हे त्यांचं शास्त्रोक्त नाव.' काही शतकाच्या कालावधीत एका बुरशीचं जाळं काही चौरस मैल,म्हणजे संपूर्ण जंगलात पसरलं जातं.या जाळ्यातून झाडांचे संदेश जंगलात पसरू शकतात आणि कीटक,दुष्काळ किंवा इतर संकटांचा इशारा सर्वांना पोचतो.सीमार्डने शोधालेल्या या जाळ्याला 'नेचर' या प्रसिद्ध नियतकालिकाने 'वूड वाईड वेब" असं नाव दिलं आहे,ज्याचा आज विज्ञानात वापर केला जातो.पण या जाळ्यातून किती आणि कोणत्या प्रकारच्या माहितीची देवाण-घेवाण होते,याचा आपला अभ्यास अजून प्राथमिक अवस्थेतच आहे. सीमार्डच्या संशोधनात असंही दिसलं की भिन्न प्रजातीची झाडं एकमेकांचे स्पर्धक असले तरी ते एकमेकांच्या संपर्कात असतात.आणि यांना मदत करणाऱ्या बुरशीचा या सर्वांमध्ये तालमेल बसवणं,समेट घडवणं आणि माहिती व पोषकद्रव्यांचं समान वाटप करणं याकडेच कल असतो.कारण त्यातून त्यांचा स्वतःचा फायदा असतो.एखादं झाड जेव्हा कमकुवत होतं तेव्हा अशा प्रकारे संवाद साधण्याची आणि स्वत:ची सुरक्षा करण्याची त्याची क्षमता कमी होते. कीटक दुर्बल झाडांची निवड करतात त्यामागे हेच कारण असावे.कीटकांना झाडांनी दिलेला संकटाचा इशारा जाणवत असावा.

झाडाच्या पानाचा चावा घेऊन कदाचित कीटक तपासात असतील की झाड संकटाचा संदेश पाठवू शकत आहे का? जर झाड मौन राहिलं तर ते आजारी तरी असेल किंवा बुरशीच्या जाळ्यापासून तुटलेलं तरी असेल.अशा वेळेस कीटकाची मेजवानीच असते.! कमकुवत झाडांप्रमाणेच जंगलातले एकलकोंडे वृक्षसुद्धा संकटापासून सुरक्षित नसतात,कारण त्यांना आजूबाजूला काय चाललं आहे याची कल्पना नसते.एका सहजीवी जंगलात असा संवाद फक्त झाडांमधून चालत नाही तर गवत आणि झुडपं ही अशाप्रकारे आपापसात संवाद करतात.पण एखाद्या शेताला भेट दिली तर तिथे मात्र वनस्पती चूपचाप बसलेली असतात.शेतीत निवडक पैदास पद्धतीमुळे (सिलेक्टिव्ह ब्रीडिंग) वनस्पतींची दुसऱ्यांबरोबर संवाद साधण्याची क्षमता नाहीशी झाली आहे.जमिनीखालून किंवा वरून ते एकमेकांशी बोलू शकत नाहीत,म्हणजे एका प्रकारे ते मूकबधीर असतात आणि त्यामुळे कीटकांची सहज शिकार बनतात.

आधुनिक शेतीमध्ये कीटकनाशकांचा अतिवापर होण्यामागचं हे एक कारण आहे.जर शेतकऱ्यांनी जंगलाकडून धडा घेतला तर कदाचित आपल्या शेतीत ते थोडी जंगली झाडांचा रानवा आणून शेतातल्या पिकांना 'बोलते' करू शकतील.झाडं आणि कीटकांतील संवाद फक्त संरक्षण आणि आजारपणाबद्दल नसतो.आपल्या विकसित प्रगल्भ घ्राणेंद्रियांच्या आधारे आपण याचा अनुभव घेतच असतो.झाडांच्या आसपास उल्हसित करणारा सुगंध दरवळत असतो,तेव्हा ही झाडं कीटकांना मंद सुगंधी आमंत्रण देत असतात,त्याबद्दल मी बोलतो आहे.फुलोरे तुमच्या-आमच्यासाठी किंवा उगीचच सुगंध सोडत नाहीत.फळणारी झाडं,विलोज आणि चेस्टनट हे सुगंधाचा वापर करून परिसरात हिंडणाऱ्या मधमाशांना आकर्षित करतात. आपल्या फुलावर बसून दुसरीकडून आणलेल्या परागाची धूळ उडवल्याबद्दल त्या मधमाशांना फुलातला मकरंद इनामात मिळतो.फुलाचे विशिष्ट रंगरूप म्हणजे कीटकांना एक संदेश असतो.त्यांच्या दृष्टीत जंगलाच्या हिरव्या आच्छादनात रंगीत फुलं म्हणजे चवदार फराळाकडे जाण्याचा मार्ग दाखवणारे फलकच असतात.म्हणजे गंध,दृष्टी आणि विद्युत प्रवाहाचा वापर करून झाडं बोलतात.(मुळांच्या टोकाशी चेतापेशीच्या माध्यमातून विद्युत प्रवाहाच्या रूपात).पण आवाज आणि श्रवणाचं काय? जरा पुन्हा त्याकडे वळू.प्रकरणाच्या सुरुवातीला मी म्हटलं की झाडं बधीर असतात पण नवीन संशोधनाने यावरही शंका घेतली आहे. युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलियाच्या मोनिका गॅगलिओनो यांनी ब्रिस्टल आणि फ्लोरेंसच्या संशोधकांबरोबर अक्षरशः जमिनीला कान लावून झाडांचे आवाज ऐकण्याचा प्रयोग केला."प्रयोगशाळेमध्ये झाडांचा अभ्यास करणं शक्य नसतं,त्यामुळे धान्याच्या बियांच्या छोट्या रोपांवर त्यांनी हा प्रयोग केला.प्रयोग सुरू झाल्यावर मुळांच्या तडतडण्याचा आवाज त्यांच्या उपकरणात नोंदला गेला.या रोपांची मुळं २२० हर्ट्स फ्रिक्वेन्सीचा आवाज करत होती. पण मुळांच्या तडतडण्याचं काय कौतुक? साधं लाकूड जरी स्टोव्हमध्ये जाळलं तरी हा आवाज येतोच की!पण या तडतडण्याच्या आवाजामुळे शास्त्रज्ञांच्या लक्षात आलं की,या आवाजाचा परिणाम वेगळ्या रोपांवर होतोय.त्यांनी नीट निरीक्षण करायला सुरुवात केली तर त्यांच्या लक्षात आलं की,प्रयोगशाळेतील ज्या धान्याच्या बिया प्रत्यक्ष प्रयोगात नव्हत्या त्यांची मुळं ही या आवाजाला प्रतिसाद देत हाती.ज्या दिशेला २२० हर्ट्सचा आवाज येत होता त्या दिशेला त्यांची टोकं वळत होती.प्रयोगशाळेतल्या गवताला या फ्रिक्वेन्सीच्या ध्वनिलहरी ऐकू येत होत्या तर! झाडं ध्वनिलहरींचा वापर करून बोलतात यावर अधिक जाणून घ्यायची माझी उत्सुकता आता वाढली,कारण हे माणसांपेक्षा फार काही वेगळं नव्हतं.आपणही आवाजाच्या माध्यमातूनच एकमेकांशी बोलतो.झाडांच्या जीवनाचं गुपित उलगडण्याची ही गुरुकिल्लीच तर नसेल ना? आपल्याला बीच,ओक आणि पाईन वृक्षांची खुशाली कळाली तर काय मजा येईल!दुर्दैवाने आपलं यातलं संशोधन फारच कमी आहे.तिथे पोहोचायला आपल्याला अजून खूप काळ लागेल.पण इतकं लक्षात ठेवा,की पुढल्या वेळेस जंगलातून चालताना काही तडतड किंवा चरचर ऐकू आली तर ती फक्त वाऱ्याचीच असेल असं नाही बरं!


द हिडन लाईफ ऑफ ट्रीज

१५ मार्च २०२३ या लेखातील पुढील भाग