* विजय गायकवाड | Vijay Gaikawad

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

२६/५/२३

सुप्रसिद्ध शिकारी व निसर्गसंवर्धक जिम कॉर्बेटच्या अजरामर शिकारकथा

परिस्थिती वाघाच्या नियंत्रणाबाहेर जाते,तेव्हा

कोणताही वाघ परिस्थिती अनुरूप आहार

स्वीकारतो.थोडक्यात सांगायचं,तर तो स्वतःहून नरभक्षक झालेला नसतो,तर तसं होणं त्याच्यावर लादलं गेलेलं असतं. 


परिस्थितीमुळे वाघ नरभक्षक होतात,हे अधिक स्पष्ट करून सांगायचं,तर दहापैकी नऊ प्रकरणांमध्ये वाघ जखमांमुळे,तर एका प्रकरणामध्ये वृद्धापकाळामुळे नरभक्षक झाल्याचं आढळलं आहे.शिकारीदरम्यान शिकाऱ्यांनी निष्काळजीपणे केलेल्या गोळीबारामुळे वाघाला जखमा झाल्याचं दिसून आलं आहे.अशा वेळी संबंधित शिकाऱ्याने माग काढत जाऊन त्या जखमी वाघाला कायमचं वेदनामुक्त करणं गरजेचं असतं,पण शिकाऱ्याने या गोष्टीकडे दुर्लक्ष केल्यामुळे वाघ नरभक्षक झाल्याचं नरभक्षक वाघाशी संबंधित एका प्रकरणामध्ये निदर्शनास आलं.त्याचबरोबर साळिंदराची शिकार करताना वाघाला झालेल्या जखमांमुळे तो नैसर्गिक पद्धतीने शिकार करू शकत नसल्याने नरभक्षक झाल्याचंही आढळून आलं आहे.'माणूस' हे काही वाघाचं नैसर्गिक अन्न नाही,पण वृद्धत्वामुळे किंवा जखमांमुळे वाघ जेव्हा शिकार करू शकत नाही, तेव्हा तो जगण्यासाठी नाइलाजाने माणसाची शिकार करून त्यावर गुजराण करायला सुरुवात करतो.


कोणताही वाघ नैसर्गिक पद्धतीने शिकार करतो, तेव्हा तो आपल्या शिकारीचा पाठलाग करतो. किंवा शिकार त्याच्यापर्यंत येण्याची वाट बघतो.भक्ष्यावर आक्रमण करताना वाघ आपला वेग, दात आणि नखं या गोष्टींवर अवलंबून असतो.त्यामुळेच बाघ जखमी असतो,त्याचे दात तुटलेले असतात किंवा सदोष असतात,त्याची नखं तुटलेली असतात,तेव्हा तो नैसर्गिक पद्धतीने शिकार करू शकत नाही.जे प्राणी त्याचं खाद्य असतात,त्यांची शिकार तो करू शकत नाही, तेव्हा स्वतःची भूक भागवण्यासाठी तो माणसाची शिकार करायला सुरुवात करतो. 'वाघाने आहारासाठी प्राण्यांकडून माणसांकडे वळणं' हा बदल बहुतांश प्रकरणांमध्ये अपघाताने घडलेला आहे,असं माझं निरीक्षण आहे.'अपघाताने' असं म्हणाताना मला नेमकं काय म्हणायचं आहे,हे स्पष्ट करण्यासाठी मी 'मुक्तेसर या नरभक्षक वाघिणीच उदाहरण देतो.


 तुलनेने तरुण असताना एकदा या वाघिणीचा साळिदराशी सामना झाला.त्या झटापटीत तिचा डोळा तर गेलाच,शिवाय साळिंदराचे पन्नासेक काटे तिच्या शरीरात रुतले.एक ते नऊ इंचाचे हे काटे तिच्या पुढच्या,उजव्या पायात घुसले.काही काटे तर तिच्या हाडांपर्यंत जाऊन 'यू' या इंग्रजी अक्षराप्रमाणे उलट होऊन बाहेर आले.त्यामुळे त्यांचा पुढचा भाग आणि शेवटचा भाग जवळजवळ आला.ती भुकेल्या अवस्थेत गवतावर तिच्या जखमा चाटत पहुडली होती.नेमक्या त्याच ठिकाणी एक स्त्री तिच्या गुरांसाठी चारा घ्यायला म्हणून गवत कापण्यासाठी आली. आधी वाघिणीने त्या स्त्रीची साधी दखलदेखील घेतली नाही,पण वाघीण जिथे पडली होती, तिथलंच गवत त्या स्त्रीने कापायला सुरुवात केल्यावर वाघिणीने त्या स्त्रीच्या डोक्यावर एक पंजाचा फटका मारला.तो आघात एवढा जबरदस्त होता की,त्या स्त्रीची कवटीच फुटली. त्या स्त्रीला इतका लगोलग मृत्यू आला की, तिला शोधणाऱ्यांना दुसऱ्या दिवशी तिचा मृतदेह सापडला,तेव्हा 'एका हातात कोयता आणि दुसऱ्या हातात कापलेलं गवत' या अवस्थेत ती पडलेली होती.ती स्त्री जिथे पडली होती,तिथे तिला तशीच टाकून वाघीण तिथून उठली आणि तिने मैलभर अंतरावर जात एका पडलेल्या झाडाचा आसरा घेतला.त्या झाडाखाली तयार झालेल्या पोकळीत ती बसून राहिली.दोन दिवसांनी एक माणूस त्या पडलेल्या झाडाचं लाकूड सरपणासाठी घेऊन जाण्यासाठी आला, तेव्हा झाडाखाली असलेल्या वाघिणीने त्याचाही जीव घेतला.तो मृत माणूस झाडाखाली तसाच पडून राहिला.


लाकूड कापायचं असल्यामुळे त्याने त्याचा सदरा काढून ठेवला होता. वाघिणीने त्याला मारताना त्याच्या पाठीवर मारलेल्या फटक्यामुळे त्याच्या शरीरातून रक्त वाहिलं.

तिची भूक भागवू शकणारं काहीतरी त्याच्या शरीरात असल्याची जाणीव त्याच्या रक्ताच्या वासामुळे तिला सगाळ्यात आधी झाली असणार,त्यामुळे तिथून उठून निघून जाताना तिने कदाचित त्याच्या पाठीचा काही भाग खाल्ला असावा. 


त्यानंतर एखाद्या दिवसानंतर कोणतंही कारण नसताना तिने तिसरा माणूस मारला असावा. त्यानंतर ती सराईत नरभक्षक झाली आणि तिला तिच्या कृत्यांची शिक्षा देईपर्यंत तिने एकूण २४ माणसं मारली.एखादा वाघ जखमी असेल,तो त्याच्या शिकारीचा फडशा पाडत असेल किंवा एखादी वाघीण तिच्या बछड्यांबरोबर असेल आणि तिला जाणीवपूर्वक त्रास दिला गेला किंवा वाघ जे काही करत असेल,त्यात अडथळा आणला गेला,तरच तो माणसाला मारतो.अशा वाघांनादेखील 'नरभक्षक' म्हटलं जात असलं, तरी प्रत्यक्षात ते 'नरभक्षक' नसतात.अशा वाघांना नरभक्षक ठरवण्याआधी मी त्यांना संशयाचा फायदा देईन आणि ते प्रकरण वाघ किंवा बिबट्या यांच्या बळीचं प्रकरण म्हणून नोंदवलं जाणार असलं,तरी तसं ठरवण्याआधी त्या बळीचं शवविच्छेदन करण्याचा आग्रह धरीन.'वाघ,बिबटे,

लांडगे,तरस यांच्या हल्ल्यात मारल्या गेलेल्या माणसाच शवविच्छेदन'ही बाब अतिशय महत्त्वाची ठरते.आत्ता मला त्या संदर्भातली उदाहरणं देता येत नसली,तरी अशा तऱ्हेने झालेल्या मृत्यूंच्या काही प्रकरणांमध्ये 'नरभक्षक प्राण्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी' अशी चुकीची नोंद झाल्याचं मला माहीत आहे.


सगळेच नरभक्षक वाघ वयोवृद्ध,गांजलेले, हतबल असल्याचा एक लोकप्रिय गैरसमज आहे.माणसाच्या शरीरातल्या मिठामुळे त्यांना त्वचेचा आजार होत असल्याचंही मानलं जातं.माणसाच्या किंवा प्राण्याच्या शरीरात मीठाचं प्रमाण नेमकं किती असतं,या संदर्भातलं उत्तर देण्याइतकं ज्ञान मला अर्थातच नाही,पण मी एवढं मात्र नक्कीच सांगू शकतो की,माणसाचं मांस खाणाऱ्या नरभक्षक वाघांची कांती अतिशय तुकतुकीत असल्याचं मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं आहे.


नरभक्षक वाघांबद्दलचा आणखी एक गैरसमज म्हणजे,त्यांचे बछडेदेखील आपोआपच नरभक्षक होतात.हा अर्थातच एक अंदाज आहे आणि तो समजण्यासारखा आहे,पण तो अभ्यासातून,

निरीक्षणातून पुढे आलेला नाही.नरभक्षक वाघांचे बछडे आपोआपच नरभक्षक होत नसण्यामागचं कारण म्हणजे,बिबटे किंवा वाघ यांच 'माणूस'

हे नैसर्गिक अन्न नाही.वाघीण किंवा बिबटीण शिकार करून जे आणून देते,तेच तिचे बछडे खातात.

आपल्या आईला माणसाची शिकार करायला मदत करणारे बछडेदेखील मला माहीत आहेत,पण आईवडलांच्या छत्रछायेतून बाहेर पडल्यानंतर किंवा आईवडील मारले गेल्यानंतर भूक भागवण्यासाठी माणसाची हत्या करायला सुरुवात केलेल्या एकाही बछड्याचं उदाहरण मला माहीत नाही.


कोणत्याही जंगली श्वापदाकडून एखादा माणूस मारला गेला,तरी हा नरबळी वाघाने किंवा बिबट्यानेच घेतला असल्याचं कायम गृहीत धरलं जातं.पण याबाबतचा एक सर्वसाधारण नियम असा आहे की,दिवसाढवळ्या होणाऱ्या मानवी शिकारी वाघाकडून झालेल्या असतात, तर बिबट्या रात्रीच्या अंधारात माणसांचा जीव घेतो.या नियमाला मी आजवर एकही अपवाद बघितलेला नाही. 


हे दोन्ही प्राणी जंगलात राहतात. रात्र आणि दिवस या दोन्ही काळात त्यांचा संचार सुरू असतो.त्यांच्या बहुतेक सगळ्या सवयी सारख्या असतात.त्यांची शिकार करण्याची पद्धत एकसारखीच असते.ते आपली मानवी शिकार खूप लांब अंतरापर्यंत वाहून नेऊ शकतात. त्यामुळे त्यांच्या शिकारीच्या वेळादेखील सारख्याच असणं अगदी नैसर्गिक आहे,पण तशा त्या नसतात.यामागचं कारण म्हणजे,या दोन्ही प्राण्यांच्या धाडसी वृत्तीमध्ये असलेला फरक! वाघ नरभक्षक होतो,तेव्हा त्याला वाटणारी माणसाबद्दलची सगळी भीती संपलेली असते.रात्रीच्या अंधारात माणसाचा वावर कमी असतो.

त्याऐवजी माणूस दिवसाउजेडी जास्त मोकळेपणाने भटकंती करतो.त्यामुळे वाघाला त्याच्या सावजाची शिकार दिवसाउजेडी सहजपणे करता येते.त्यासाठी त्याला माणसाच्या वसतिस्थानाच्या परिसरात रात्री जाण्याची गरज नसते.


त्याउलट बिबट्याचं असतं.त्याने कितीही नरबळी घेतले,तरी त्याची माणसाबद्दलची भीती जराही कमी होत नाही.त्याला दिवसाउजोडी माणसाचा सामना अजिबातच करायचा नसतो.त्यामुळे माणूस रात्रीच्या वेळी बाहेर पडला की,बिबट्या त्याची शिकार करतो किंवा रात्रीच्या वेळी मानवी वस्तीमध्ये शिरून बिबट्या नरबळी घेतो.माणसाबद्दलची भीती संपल्यामुळे वाघ दिवसा नरबळी घेतो,तर बिबट्याला माणसाबद्दल वाटणारी भीती काही केल्या कमी होत नसल्याने तो रात्रीच्या अंधारात माणसावर हल्ला करतो. या दोन्ही प्राण्यांच्या या वैशिष्ट्यांमुळे नरभक्षक बिबट्याच्या तुलनेत नरभक्षक वाघाची शिकार करणं सोपं जातं.


नरभक्षक वाघ ज्या परिसरात वावरतात,त्या परिसरात त्यांना उपलब्ध असलेल्या नैसर्गिक अन्नाच्या उपलब्धतेवर,ते नरभक्षक होण्यासाठी कारणीभूत ठरलेल्या त्यांच्या शारीरिक अकार्यक्षमतेच्या स्वरूपावर आणि हे नरभक्षक म्हणजे बछड्यांसह वावरणारी मादी आहेत की नर आहेत यांवर नरभक्षक वाघांच्या शिकारीची वारंवारिता अवलंबून असते.


एखाद्या विषयामधलं आपलं ज्ञान कमी असेल आणि त्याआधारे आपल्याला एखादं मत तयार करता येत नसेल,तर आपण दुसऱ्याच्या ज्ञानाचा आधार घेतो.

त्यासाठी वाघाइतकं चपखल उदाहरण देता येणार नाही.इथे मी नरभक्षक वाघांबद्दल नाही,तर एकूण सगळ्याच वाघांबद्दल बोलतो आहे. ( कुमाऊँचे नरभक्षक - जिम कॉर्बेट,अनुवाद - वैशाली चिटणीस,डायमंड पब्लिकेशन्स,लेखकाचे मनोगत )


'वाघासारखा क्रूर','वाघासारखा रक्तपिपासू' असे उल्लेख मी वाचतो,तेव्हा मला हातात गन घेतलेला एक लहान मुलगा डोळ्यांसमोर दिसायला लागतो.जिथे प्रत्येकी दहा दहा वाघ होते अशा तेराई आणि भावरच्या जंगलांमध्ये हा मुलगा हुंदडत असायचा.जंगलात फिरताना रात्र झाली की,तो तिथेच कुठेतरी उबेला छोटीशी शेकोटी पेटवून झोपून जायचा.कधी लांबून कुठूनतरी,तर कधी अगदी हातभर अंतरावरून कानावर पडणाऱ्या वाघाच्या हाकाऱ्यांनी (कॉल्स) त्याला जाग यायची.जवळच्या शेकोटीमध्ये आणखी एखादं लाकूड टाकून,कूस बदलून,जराही अस्वस्थ न होता तो पुन्हा झोपून जायचा.त्याच्या स्वतःच्या छोट्याशा अनुभव विश्वातून,त्याच्याप्रमाणेच जंगलात दिवसचे दिवस भटकंती करायची आवड असणाऱ्यांच्या अनुभवातून त्याला कळलं होतं की,तुम्ही जर वाघाच्या वाट्याला गेला नाहीत,त्याला त्रास दिला नाहीत,तर तोही तुमच्या वाट्याला जात नाही.दिवसाच्या वेळेत वाघ दिसला,तर त्याला टाळायचं असतं आणि ते शक्यच नसेल,तर तो समोरून निघून जाईपर्यंत अत्यंत स्तब्ध उभ राहायचं असतं,हेही त्याला या अनुभवी लोकांकडून समजलं होतं.एकदा हा मुलगा मोकळ्या रानात उघड्यावर चरत असलेल्या जंगली कोंबड्यांच्या मागावर होता.तिथेच असलेल्या,त्याच्याच उंचीच्या आलुबुखारच्या झुडपातून रांगत जाऊन त्या जंगली कोंबड्यांकडे तो डोकावून बघत असताना ते झुडुप हललं आणि एक वाघ बाहेर आला.

वाघाच्या चेहेऱ्यावर जे भाव होते,त्यांतून जणू तो त्या मुलाला विचारू इच्छित होता, 'अरे बाळा, तू इथे काय करतो आहेस ?' त्यावर कोणतंही उत्तर मिळालं नाही, तेव्हा तो वळला आणि एकदाही मागे न बघता तिथून अगदी शांतपणे निघून गेला.त्याचबरोबर शेतात काम करणारी,जनावरांच्या चाऱ्यासाठी गवत कापणारी,सरपण गोळा करणारी हजारो माणसं मला आठवतात,जी वाघ आराम करत असलेल्या एखाद्या ठिकाणाच्या जवळपास या कामांमध्ये दिवसचे दिवस घालवतात आणि रात्री आपापल्या घरी अगदी सुखरूप परत येतात. अशा वेळी तथाकथित 'क्रूर' आणि 'रक्तपिपासू' वाघ त्यांच्या जवळपास असतो आणि त्यांच्यावर लक्ष ठेवूनही असतो,पण हे त्यांच्या गावीदेखील नसतं.


तो मुलगा आलुबुखारच्या झुडपात डोकावला असताना तिथून वाघ बाहेर आल्याच्या घटनेला आता पन्नासेक वर्षं उलटून गेली आहेत.त्या मुलाची बत्तीसेक वर्षं नरभक्षक वाघाचा माग काढण्यात गेली आहेत.वाघाने घेतलेल्या नरबळींची अनेक भयंकर दृश्यं मी आजवर बघितली असली,तरी वाघाची कुणी खोड काढली नसेल किंवा त्याला किंवा त्याच्या बछड्यांना भूक लागली नसेल,तर वाघ जाणीवपूर्वक,क्रूरपणे वागला असल्याचं किंवा रक्तपिपासू झाला असल्याचं एकही उदाहरण मी आजतागायत बघितलेलं नाही.


निसर्गाच्या साखळीमध्ये समतोल राखण्यासाठी 'वाघ' हा महत्त्वाचा दुवा ठरतो.त्याचं नैसर्गिक खाद्य माणसाकडून हिरावून घेतलं जातं तेव्हा किंवा अगदी दुर्मीळ प्रसंगांमध्ये खरोखरच गरज म्हणून तो माणसांना मारतो.त्याचं नैसर्गिक भक्ष्य त्याला मिळालं नाही,तर तो ज्या गायीगुरांना मारतो,त्यांचं प्रमाण दोन टक्के आहे.असं असताना या संपूर्ण प्रजातीवरच 'क्रूर', 'रक्तपिपासू' असे शिक्के मारणं चुकीचं आहे.


शिकाऱ्यांच्या अनेक वर्षांच्या भटकंतीमधून, अनुभवांतून त्यांची मतं झालेली असतात.त्यामुळे ते त्यांच्या मतांबाबत आग्रही असतात.वाघाची शिकार मचाणावर बसून करायची,हत्तीच्या पाठीवर बसून करायची की जंगलात फिरून करायची याबाबत शिकाऱ्यांमध्ये एक वेळ एकमत नसेल,पण माझ्या एका मुदद्याशी मात्र झाडून सगळे शिकारी सहमत असतील आणि तो म्हणजे, 


वाघ हा असीम असं धैर्य असलेला,मोठ्या मनाचा,सहृदय असा उमदा प्राणी आहे.प्राप्त परिस्थितीत त्याच्या बाजूने लोकमताचा रेटा उभा राहिला नाही आणि तो जर कायमचा नष्ट झाला,तर आपला देश प्राणिसंपदेमधला हा मानबिंदू कायमचा गमावून बसेल!


आमच्या या डोंगराळ भागात प्रामुख्याने हिंदू समाजातले लोक राहतात.हिंदू लोकांमध्ये मृत्यूनंतर मृतदेह जाळण्याची पद्धत आहे.हे अंत्यसंस्कार सहसा एखाद्या झऱ्याच्या किंवा नदीच्या काठावरच होतात.कारण त्यानंतर ती राख नदीच्या पाण्यात सोडली जाते.या नद्या पुढे गंगा नदीला जाऊन मिळतात आणि गंगा नदी समुद्राला जाऊन मिळते.या परिसरामधली बहुतेक गाव उंचावर वसलेली आहेत आणि नद्या या गावांपासून कित्येक मैलांवर असलेल्या दऱ्याखोऱ्यांमधून वाहतात.त्यामुळे गावांमधून एखादा मृतदेह उचलून अंत्यसंस्कारासाठी नदीकाठपर्यंत नेण्यासाठी मनुष्यबळाची गरज असते.चितेसाठीचं सामानही तिथपर्यंत वाहून न्यावं लागतं.या सगळ्यासाठी खर्चही भरपूर येतो.गावांमध्ये राहणाऱ्या साध्या,गरीब कुटुंबांना हा सगळा खर्च परवडू शकत नाही.सामान्य परिस्थितीत खिशाला कात्री लावून हा खर्च करून अंत्यसंस्कार नीट पार पाडले जातील, असं बघितलं जातं.पण एखादी साथ येते आणि माणसं पटापट मरायला लागतात,तेव्हा खाली खोऱ्यात,नदीकाठी मृतदेह नेऊन अंत्यसंस्कार केले जात नाहीत.त्याऐवजी एक अगदी साधा विधी केला जातो. संबंधित मृतदेहाच्या तोंडात पेटता निखारा ठेवला जातो आणि तो मृतदेह कड्यावरुन खाली भिरकावला जातो.


बिबट्या ज्या परिसरात वावरतो,त्या परिसरात त्याच्या नैसर्गिक अन्नाची कमतरता असेल आणि त्याला हे मानवी देह सहजपणे उपलब्ध व्हायला लागले,तर त्याला मानवी मांसाची फार चटकन सवय लागते.रोगराई संपली आणि परिस्थिती पूर्ववत झाली,तरी त्याला त्या परिसरात त्याचं नैसर्गिक अन्न उपलब्ध होत नाही,तेव्हा तो नरबळी घेतो.


कुमाऊंच्या नरभक्षक बिबट्यांपैकी ज्या दोन बिबट्यांनी एकूण ५२० माणसं मारली, त्यांच्यापैकी एक बिबट्या कॉलराच्या साथीच्या मोठ्या उद्रेकानंतर नरभक्षक झाला,तर दुसरा १९१८ साली भारतात पसरलेल्या, 'वॉर फीवर' या नावाने ओळखल्या जाणाऱ्या विचित्र तापाच्या साथीनंतर नरभक्षक झाला.

२४/५/२३

माणसाला संवेदनशीलतेची ओळख करून देणारा काव्य संग्रह श्रावण सर..

माणूस हा परिस्थितीचे अपत्य नसून परिस्थिती माणसाचे अपत्य असते.बेंजामिन डिझरेलीचे हे जगण्याचे सुत्र कसं जगायला हवं याचं आत्मभान देतं.


काही दिवसांपूर्वी मला श्रावण सर हा काव्यसंग्रह श्रावण सखुबाई रंगनाथराव भवर यांच्याकडून मिळाला. हे आमचे परममित्र आहेत,पण अजूनही आमची प्रत्यक्षात भेट झालेली नाही,तरीही पण फोनवरील सुसंवादातून आम्ही जानी दोस्त बनलेलो आहोत. ( हि भेट घडवून आणणारे अवलिया म्हणजे आमचे माधव गव्हाने सर ) विचारांची देवाणघेवाण यातून विचारांची प्रस्तावना समजलेलीआहे.


या काव्यसंग्रहाचे मुखपृष्ठ मानवी जीवनातील स्थितंतर याबद्दल सांगत आहे.हे उत्कृष्ट कवी विष्णू थोरे यांनी तयार केलेला आहे व यातून त्यांचे थोरपण दिसून येते.

संकल्पना-सौ.वंदना श्रावण भवर यांची आहे.अर्पण पत्रिका बाप,मोठी आई,आई यांना समर्पित केलेली आहे.लीला शिंदे सुप्रसिद्ध बाल साहित्यिक,नारायण पुरी,

श्री.किशोर शितोळे (अध्यक्ष-देवगिरी नागरी सहकारी बँक लि.औरंगाबाद,अध्यक्ष-जलदूत NGO.औरंगाबाद)

प्रा.संजय गायकवाड,यांचे संदेश व अभिप्राय या काव्यसंग्रहाला लाभले आहेत.


मुखपृष्ठावर माणूस,संवादशील संवाद,सुसंवाद याची सांगड घालून एक परिपूर्ण समाज निर्माण करण्याचा,

तंत्रज्ञान स्वीकारत असताना माणुसकीची नाळ अखंड राहिली पाहिजे.हा कवीचा प्रामाणिक अट्टाहास वाखाणण्याजोगा आहे.


यामध्ये ७४ कविता आहेत.ज्या मानवी जीवनातील सर्वांगाला स्पर्श करून जातात.तर पृष्ठ संख्या 'मोकळ्या' पानासहीत ११४ आहे.मोकळी पानं ठेवणं हे धाडसाचं काम आहे याबद्दल संबंधितांचे आभार! प्रकाशक शब्दगंध समूह प्रकाशन औरंगाबाद यांची आकर्षक मांडणी शब्दांचा,आकार मोठा यासाठी त्यांचे आभार..


तू कोण ? या कवितेमध्ये जगातील चाललेल्या घडामोडीचे वास्तव मांडलेले आहे.सर्वांसाठी करता करता माझं माझ्यासाठी जगायचं राहिलं हे सांगायला कवी मात्र विसरलेले नाहीत.


माणूस भुकेला झाला! हि कविता भावनांचा माणूसकीचा सडा रोजच पडतो इथं पैशापाई, प्रसिद्धी पाई,प्रत्येक जण नडतो इथं,रक्ताच्या नात्याचं मोल,आज खुजं झालं या कवितेत सध्या माणूस माणसाशी कसा वागतो याचं फसवं पण सत्य असं प्रतिबिंब आहे.


मही माय आईचं मोठेपण सांगते.मह्या मायनं, कधीच स्वप्न पाहिलं नाही.. कारण ती स्वप्नासाठी,कधी झोपलीच नाही.कामाच्या थकव्यानं तिला भाकरीच्या तुकड्याच्या शोधातच झोपवलं मह्या मायनं.कधीचं स्वप्न पाहिलं नाही.संसाराच ही मांडणी वेदना देणारी आहे.


पैसा पैसा काय करू शकतो याचं वर्णन या कवितेत केलेलं आहे.पैशानं बरचं काही मिळतं पण पैशांन सर्व काही मिळत नाही.पैसा देवासारखा वाटला तरी देव पैशाला मानू नका.अंतिम क्षणी माणसाचं येतात कामा जेव्हा पैसा देतो धोका.पैसा बोलतो असे म्हणणे योग्य आहे; पण पैसा पिचलेली भाषा बोलतो.त्यापेक्षा ह्रदय अधिक चांगले,स्पष्ट आणि शहाणपणाची भाषा बोलते.या पुस्तकात वाचलेल्या वैचारिक शहाणपणाची ही कविता वाचताना आठवण झाली.


संवाद मुका झाला..! यामध्ये राम ते हिटलर प्रवास अतिशय मार्मिकपणे मांडला आहे.


जी कवीचा वाचल्यामुळे या नात्याबद्दल पुन्हा खोलात जाऊन विचार करावासा वाटला ती कविता म्हणजे रक्षाबंधन


धागा कुणाचा सप्तरंगी तर,

कुणाचा विविध रंगात, 

नात्यात रंगलेला 

श्रावणमासात, 

भाऊ-बहिणीच्या मनात, 

आपुलकीनं बांधलेला 

धागा नुसता रेशीमबंध नाही, 

ती एक नात्यांची नाळ आहे. 

लाडक्या भाऊरायाच्या हाती, 

बांधते ताईचं हृदय आभाळ आहे 

कधी भाऊ, कधी बाप, 

तर कधी माय बनून जपते ताई 

आपल्या लहान-मोठ्या भावाखातर, 

स्वतः दिव्यासारखी तपते ताई 

कधी गुरु बनून शिकविते, 

तर कधी समईसारखी जळते ताई 

बहिणीचं जगणं फक्त, 

तिच्या संसारापुरतं राहत नाही,


सासरी असूनही माहेरची आस, 

शेवटपर्यंत तुटत नाही 

घराचं घरपण माय, 

तर बहीण घरातील देव्हारा 

बहिणीविना सुनासुना,

कुटुंबाचा गाभारा 

मायनंतर माया लावणारं, 

जगात दुसरं कुणीच नाही 

लय थोर नशीब लागत भाऊ, 

ज्या घरात असते ताई 

दरसाल पौर्णिमेला मन गहिवरून येते, 

बहीण नसल्याची सल मनात सलत जाते

 मजबूत बांधा असला तरी, 

मनगट माझं ढिसूर आहे. 

बहिणीच्या राखीखातर, 

मन अजूनही आतुर आहे 

मन अजूनही आतुर आहे.


ही कविता वाचून मी स्तब्ध झालो होतो या कवितेमुळे एक नवीन दृष्टिकोन मला मिळाला.


राजा शिवछत्रपती हि कविता संपुर्ण पराक्रमी इतिहास सांगुन गेली व मी माणुस म्हणून का आहे याचं उत्तर देवून गेली.


सोनेरी सूर्य घायाळ झाला 

त्या क्षणाला,त्या क्षणाला शिवनेरीवर,

महाराष्ट्राचा मानबिंदू जन्मला

 सह्याद्रीच्या पानापानात,

 मातीच्या कणाकणात, 

महाराष्ट्राच्या मनामनात, 

अन् कालचक्राच्या क्षणाक्षणात

 नवचैतन्य निर्माण झालं 

महाराष्ट्राच्या मातीचं, 

कुलदैवत जन्माला आलं 

माँसाहेब जिजाऊच्या साधनेला,

शहाजीराजेंच्या समिधेला शिवराय, 

फळ आलं अन् अवघ्या महाराष्ट्राचं, 

जन-मन आनंदात न्हालं


आधुनिक पहाट ! हि कविता सध्या लोकांचे ढासळलेलं आरोग्य व दवाखान्यातील वारी,तपासणीच्या

नावाखाली होणारी लूट पण अजूनही दवाखान्याला देऊळ,डॉक्टरला देव मानलं जातं ही श्रध्दाच विश्वास ठेव म्हणून सांगते.ही श्रद्धा माझी ही श्रध्दा आहे.


बाप कधी निवांत असतो का ? 

जिन्याखालचं जिनं

लोकल टू ग्लोबल व्हाया संवाद !

काळाचा घाला

हसरा बुद्ध ..दासरा माणूस

भीमा तुझ्यामुळे

आधुनिक रावण

रंग बोलके

श्रावण सरी !

आनंद शोधता आला पाहिजे !

न्यू वर्ष नव हर्ष

किमान मास्तर हवा !

सावधान! घर मुकं होत आहे !

माय मराठी


या कविता वाचल्या आणि..


" भावना हाच नियम आणि नियम हीच भावना.भावना हा शक्तीचा स्तोत्र आहे.त्यामुळे एखादी गोष्ट प्राप्त करायची असली तर आपल्या भावना समृद्ध असायला हव्यात."


'मनोविज्ञानाचे गुरू थॉमस ट्रॉवर्ड'  यांची प्रखरपणे आठवण झाली.


हा काव्यसंग्रह वाचला आणि बाजूला ठेवला.जणू हा काव्यसंग्रह बोरिस पास्तरनाक

यांचे खालील वाक्यच सांगत आहे.


जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,

जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे. 


शेवटी जाता जाता


कवी श्रावण सखुबाई रंगनाथराव भवर यांनी जो अट्टाहास केला आहे.आपुलकी,आत्मीयता आपल्या हातून आपल्या डोळ्यादेखत सुटत चालली आहे.हे धरुन ठेवण्याचे कार्य हा श्रावण सर काव्यसंग्रह नक्कीच करेल.


अश्रू म्हणजे मानवाला लाभलेले भावना व्यक्त करण्याचे अनोखे चिन्ह,ॲमिग्डाला जवळच्या विशिष्ट अश्रुग्रंथीमुळे अश्रू निर्माण होतात.रडणाऱ्याला जवळ घेतले,थोपटले किंवा इतर मार्गाने आश्वासन दिले म्हणजे हा भागच हुंदके थांबवतो..


इमोशनल इंटेलिजन्स मधील हा सत्य वैचारिक विचार मांडणारा काव्यसंग्रह आहे.

धन्यवाद व आभार

२२/५/२३

संघप्रिय कीटांतील स्पर्धा..

संघप्रिय कीटकांच्यातही प्रामुख्याने झगडा चालतो,तो असतो टापूंसाठी.मुंग्यांचा एकेक परिवार एक राणी व तिची संतती - ही आपापल्या वारुळांभोवतीचा जमेल तेवढा मोठा टापू आपल्या ताब्यात ठेवतात.आपल्याच जातीच्या इतर वारुळांच्या मुंग्यांना तिथून हाकलतात,

आणि ज्यांच्याशी आहाराबाबत स्पर्धा होऊ शकेल अशा इतर जातींच्या मुंग्यांनाही.अशा स्पर्धेत मुंग्या काही एकदम हातघाईवर येत नाहीत.सुरुवात होते नुसत्या शक्तिप्रदर्शनाने.वारूळ पुराणात रॅफच्या अभ्यास निबंधातले विस्तृत उतारे आहेत.


हे दोन वारुळांमधले मुंग्यांचे गट भेटले आणि एकमेकांपुढे नाचायला लागले.पण हे काही शृंगारिक नृत्य नव्हते.तो तर एक सामना होता, दोन वारुळांमधला आपापला मुलूख काबूत ठेवण्याबद्दलचा.दोन्ही बाजूच्या मुंग्या विरोधी पक्षाची ताकद आजमावत होत्या.जोखताना स्वतःच्या ताकदीची जाहिरातही करत होत्या. असं करण्यात कोणत्याच मुंगीला धोका नव्हता; मृत्यूचा सोडाच,पण जखमांचाही.हे होतं शत्रूला जोखणं आणि आपली शक्ती दाखवणं; पहेलवानांनी एकमेकांपुढे शड्डू ठोकण्यासारखं. ह्यात आपली सरशी होईल,आपला टापू सांभाळून राहता येईल,असं दोन्ही वारुळांच्या मुंग्यांना वाटत होतं.


हे शक्तिप्रदर्शन ही काही युद्धाची सुरुवात नव्हती. माणसांची सैन्यं जशी एकमेकांना दरडावायला मिरवणुका काढतात,आपापसातच सराव-युद्ध खेळतात,तसा हा प्रकार होता.भारत-पाक सीमेवर 'वाघा बॉर्डर' ठाण्यावर जसे रोज थाडथाड पाय आपटत दोन्हीकडचे सैनिक एकमेकांवर गुरकावतात,तसा हा खेळ.दोन्ही वारुळांना आपली ताकद दुसऱ्याला दाखवायची होती,एवढंच सामान्यतः एकांडे पशू अशा शक्तिप्रदर्शनावरच मिटवतात.दोघा प्रतिस्पर्ध्यांपैकी एक कोणीतरी आपल्याला हे भांडण जड जाईल असे ठरवून पड घेतो.. परस्परांना इजा करायचे टाळतो.कोणीच दुसऱ्याला जिवे मारायचा विचार करत नाही. 


पण निसर्गाच्या रहाटगाडग्यात संघप्रिय जातींनी हा संयम सोडून दिला आहे.आप्त निवडीच्या गणितात एकेका वैयक्तिक प्राण्याला काही खास किंमत नसते.

पुऱ्या परिवाराचाच विचार असतो. तेव्हा आपापल्या संघाच्या हितसंबंधांसाठी त्याचे सदस्य शिर तळहातावर घेऊन लढायला तयार असतात.

आपापल्या टापूचे संरक्षण करण्यासाठी स्वतःचा जीव गमावायला सज्ज असतात,आणि अर्थातच जोडीने प्रतिस्पर्ध्याचा खून पाडायला.एकांड्या पशूंत स्वार्थत्यागाला जशी सक्त मर्यादा असते,

तशीच क्रौर्यालाही मर्यादा असते. 


ह्याउलट संघप्रिय पशूंत जसा शर्थीचा स्वार्थत्याग पाहायला मिळतो,तसेच अपरिमित क्रौर्यही.म्हणून अशा मुंग्यांच्यात शक्तिप्रदर्शन संपले की धुमश्चक्री सुरू होऊ शकते.रॅफच्या अभ्यासनिबंधात ह्याचेही वर्णन आहे.


आता दिखाऊ शक्तिप्रदर्शन संपले.कोणतीच मुंगी ताठ उभी राहून उंची वाढवेना,की पोट फुगवून आकार वाढवेना.आता एकमेकींवर चढून आपल्या करवती

सारख्या जबड्यांनी शत्रूचे वेगवेगळे अवयव तोडायचा प्रयत्न होऊ लागला. कवच नसलेल्या भागांना दंश करून विषाचा मारा होऊ लागला.जखमी झालेल्या शत्रूंची खांडोळी उडवली जाऊ लागली.लवकरच सगळं क्षेत्र मेलेल्या आणि जायबंदी मुंग्यांनी भरून गेलं. बहुतेक मेलेल्या मुंग्या पायवाट-वारुळाच्या होत्या.त्यांच्यात राणीची सेवा करणारी,नंतर वारूळ सावरायला मदत करणारी पुढारी मुंगीही होती.तिला ओढा-मुंग्यांनी मारून तिचे तुकडे केले होते.


जर लढाईच्या वेळी पायवाट-राणी जिवंत असती आणि ओढा-मुंग्यांनी तिला पकडलं असतं,तर तत्क्षणी तिच्या खांडोळ्या उडवल्या गेल्या असत्या.


हरलेल्या वारुळांच्या राण्यांना क्षणभरही जिवंत ठेवलं जात नाही.एक म्हणजे एकच राणी चालू शकते.त्या बाबतीत मुंग्यांची मनं कठोर असतात. एकच एक म्होरक्या खपणार,बाकी सगळ्यांनी निमूटपणे त्याच्या सांगण्यानुसार वागायचं असतं! 


म्हणूनच दोन वारुळांमध्ये कधीच तह होत नाही की मैत्री होत नाही... वारुळाची जागा एकाच परिवाराच्या हुकमतीखाली राखणं हे अटळ, अपरिहार्य असतं.आणि वारुळाचं क्षेत्र काहीही करून,प्रसंगी जीव देऊनही राखावं लागतं.


आर्जेन्टीनी मुंग्यांची अगडबंब महानगरी..


मुंग्यांचे सगळे आचरण,एका बाजूनी परक्या परिवारांच्या मुंग्यांना आपल्या टापूतून हाकलणे, जमेल तेव्हा परक्या परिवारांचा मुलूख काबीज करणे,त्यासाठी जरूर तर शर्थीची लढाई करणे, असे खटाटोप,आणि दुसऱ्या बाजूनी आपल्या परिवारात एकच राणी हवी,एकीच्याच आधिपत्याखाली सगळ्यांनी आपापल्या जबाबदाऱ्या सांभाळायला पाहिजेत असा अट्टाहास,सारे सारे पूर्णत: उपजत प्रवृत्तींवर अवलंबून असते.सारे स्वाभाविक,

संस्कारजन्य असे काहीही नाही.सारे त्यांच्या जनुकांच्यात नोंदून ठेवलेले गोंदवून ठेवलेले.अर्थातच जनुकांत स्थित्यंतर होऊन ते बदलूही शकते.परंतु, ह्या भांडकुदळ व एकीलाच राणी मानण्याच्या प्रवृत्तींतून मुंग्यांच्या कुलाची भरभराट झाली आहे.त्यांना भूमितलावर महत्त्वाचे स्थान मिळाले आहे. म्हणून ह्या साऱ्या प्रवृत्ती सर्वप्रचलित झाल्या आहेत.पण अपवाद नसेल तर ती जीवसृष्टी कुठली? ह्या दोनही प्रवृत्ती सोडून दिलेली एक मुंग्यांची जात अलीकडे आढळली आहे - ह्या आहेत एक महापरिवार स्थापन करणाऱ्या आर्जेन्टीनी मुंग्या.ह्या आहेत मूळच्या आर्जेन्टिनातील पराना नदीखोऱ्याच्या रहिवासी. इथे प्रत्येक परिवाराच्या सदस्याच्या शिंगांवर त्यांचा त्यांचा खास वास चोपडलेला असतो.त्या वासामुळे आर्जेन्टीनी मुंग्या इतर मुंग्यांप्रमाणेच परक्या परिवारांच्या सदस्यांशी फटकून वागतात, आपापला टापू राखून ठेवतात. ह्या मूलप्रदेशातल्या आर्जेन्टीनी मुंग्या एका परिवारात एकाच राणीला जगू देतात.


पण गेल्या काही दशकांत आर्जेन्टीनी मुंग्या मूळच्या निवासस्थानातून बाहेर पडून जगभर समशीतोष्ण प्रदेशात पसरल्या आहेत.तिथे त्यांच्यात कायनु-बायनु जनुकीय परिवर्तन झाले आहे हे नक्की,पण नेमके काय ह्याचा अजून उलगडा झालेला नाही.


पण इतर साऱ्या मुंगी जातींच्या मानाने नव्याने वसाहत केलेल्या प्रदेशातल्या आर्जेन्टीनी मुंग्यांत जनुकीय पातळीवर प्रचंड साधर्म्य आढळते,अगदी एकाच परिवारातल्या आया-बहिणींइतके नाही,तरी खूपच - खूप,मुख्य म्हणजे ह्या जनुकीय साधर्म्यामुळे त्यांच्या शिंगांवर चोपडलेला वासही अगदी एकासारखा एक असतो,आणि म्हणून त्यांनी दुसऱ्या आर्जेन्टीनी मुंग्यांशी भांडणे बंद केले आहे.आपण सगळ्याच बहिणी- बहिणी अशा वृत्तीने त्या वागू लागल्या आहेत.ह्याच्या बरोबरच त्यांनी एक नवीच प्रजनन प्रणाली स्वीकारली आहे.बहुतेक साऱ्या मुंग्यांत विशिष्ट ऋतूत खास आहार देऊन नव्या राजकन्या व नर पोसले जातात.त्यांना पंख असतात,आणि एका मोक्यावर अनेक वारुळांतून ह्या राजकन्या आणि नर भरारी मारतात. तिथे एकमेकांना भेटतात,त्यांचा समागम होतो,आणि आता फळलेल्या आणि राणीपदाला पोचलेल्या माद्या पंख कापून नवे वारूळ स्थापतात,त्यात अंडी घालतात,मग अंड्यांतून बाहेर येणाऱ्या स्वतःच्या मुलींच्या मदतीने नव्या परिवाराची स्थापना करतात.ह्यात अर्थातच खूप खूप अडचणी येतात.दरम्यान आपले जीवितकार्य संपलेले नर तातडीने मृत्युमुखी पडतात.


आर्जेन्टीनी मुंग्यांनी हे सगळे सोडून दिले आहे. त्यांच्या राजकन्या हवेत भरारी न मारताच एखाद्या नराला भेटतात,त्याच्याशी समागम झाल्यावर आधीच्या परिवारातल्या पाच-दहा बहिणींच्या मदतीने नवा परिवार सुरू करतात. शिवाय अशा वेगवेगळ्या परिवारांच्यात स्पर्धा, भांडणे हीही भानगड नाही.सगळेच एका महापरिवाराचे सदस्य.ह्या अजब प्रणालीने नव-नव्या प्रदेशांत वस्ती स्थापन केलेल्या आर्जेन्टीनी मुंग्यांचे एक अचाट पेव फुटले आहे.टिचग्या,जेमतेम तीन मिलिमीटर लांब. कोणत्याही बारीकसारीक फटीतही सहज घुसू शकणाऱ्या.


पण भूमध्य समुद्राकाठी इटली,फ्रान्स,स्पेन व पोर्तुगाल ह्या चार देशांच्या किनारपट्टीवर सहा हजार किलोमीटर लांब,म्हणजे भारताच्या समुद्रकिनाऱ्यावर मुंबईपासून कोलकात्यापर्यंत,एवढी त्यांची एक विशाल महानगरी पसरली आहे.शिवाय अशाच आणखी दोन शेकडो किलोमीटर लांब महानगऱ्या कॅलिफोर्नियात आणि जपानातही पसरल्या आहेत. 


त्यांत परार्धावधी मुंग्या राहतात,आणि सगळ्यात आश्चर्यजनक गोष्ट म्हणजे ह्या साऱ्या तीनही खंडांवरच्या आर्जेन्टीनी मुंग्या स्वतःला बहिणी - बहिणी मानतात,त्यांना सारखेच वास येतात,त्या एकमेकींशी भांडण-तंटा काही न करता जग जिंकत राहतात !


पण हा पराक्रम गाजवताना साहजिकच ते जो मुलूख काबीज करतात तिथल्या मूलवासियांचा निःपात करतात.आर्जेन्टीनी मुंग्या कॅलिफोर्नियात जशा पसरल्या,तशा तिथल्या आधीच्या रहिवासी मुंग्यांच्या अनेक प्रजाती अंतर्धान पावल्या.मग ह्या मूल रहिवासी मुंग्यांद्वारे परागीकरण होणाऱ्या काही वनस्पती,तसेच मुंग्यांना खाऊन जगणारे शिंगवाले सरडे पण नामशेष झाले.


१८ मे २०२३ या लेखातील पुढील भाग..

२०/५/२३

आपल्यातल्या आणि परक्या मुंग्या

मुंग्या-मुंगळ्यांचे परिवार आपल्या शेजाऱ्यांशी सतत भांडत-तंडत असतात.प्रत्येक समूहाची एक राणी मुंगी आई,बाकी सगळ्या कामकरी, लष्करी मुंग्या एकमेकींच्या मुंगी बहिणी-बहिणी. सगळ्यांनी मिळून अन्न गोळा

करायचे,चावून चावून एकमेकींना भरवायचे.शिवाय राणी मुद्दाम पाझरते असे रस सगळ्यांनी चाटत राहायचे. ह्यातून प्रत्येक परिवाराचा एक विशिष्ट गंध साकारतो.आपला तो सुगंध,परक्या परिवारांचे झाडून सारे दुर्गंध.कोणी मुंगी भेटली की तिला हुंगायची,आपल्या साऱ्या भगिनी सुगंधा. दुर्गंधी असली तर ती आहे आपली हाडवैरीण.. शक्यतो त्यांना आपल्या टापूतून हाकलून द्यायचे,जमेल तेव्हा त्यांचा मुलूख काबीज करायचा,त्यासाठी


 'आम्ही मुंगळ्यांच्या पोरी नाही भिणार मरणाला' 


अशी शर्थीची लढाई करायची.मुंग्या-मधमाशांच्या परिवारांत इतर परिवार सदस्यांची ओळख केवळ आपल्याच सुगंधाची,आपल्यातलीच एवढ्यावर मर्यादित असते.


एक खाशी राणी मुंगी - मधमाशी सोडली तर

कोणीही कुणालाही बारकाव्याने वैयक्तिक पातळीवर ओळखत नसते. 


दर वर्षी नेमाने विशिष्ट ऋतूंत एका जातीच्या सगळ्या परिवारांनी नव्या पंखवाल्या राजकन्या,आणि उड्डाणाला उत्सुक,प्रेमपिपासू पंखवाले नर वाढवायचे.उडता उडता त्यांनी जोडीदार शोधायचे.समागमानंतर नरांनी शांत चित्ते मृत्यूला सामोरे जायचे,तर आता फळलेल्या राण्यांनी आपले नवे कुटुंब स्थापायसाठी झटायचे.या कठीण प्रसंगातून पार पडून जर राणीच्या थोरल्या लेकी जगल्या वाढल्या,तर त्यांनी कामाला लागायचे,आपला भगिनी परिवार जोपासायचा.


ही होती मुंग्यांची सनातन रूढी.निसर्गाच्या परीक्षेत उतरलेली.गेल्या दहा कोटी वर्षांत नव्या-नव्या जीवनप्रणाली शोधून काढत मुंग्या- मुंगळे जगभर पसरले आहेत.एकजुटीमुळे मुंग्या-मुंगळ्यांना आपल्याहून खूप मोठ्या सावजांची शिकार करणे शक्य होते. 


याचा फायदा घेत लष्करी डोंगळ्यांच्या अनेक जाती उपजल्या आहेत.यांची प्रचंड फौज कायमची एकाच वारुळात तळ ठोकून राहात नाही.मुक्काम करायचा झाला की पायात पाय गुंफवून ते आपल्या शरीरांचा तंबू बनवतात. या तंबूच्या आसऱ्यात राणीला,पिल्लांना सांभाळतात.मधूनमधून प्रजोत्पादन थांबवून दररोज कूच करत राहतात.नव्या नव्या मुलखात घुसून तिथल्या मोठ-मोठ्या किड्यांची,पैशांची, विंचवांची,बेडकांची शिकार करतात.


एक लक्ष वर्षांपूर्वी अवतरलेल्या मानवाच्या यशाचे मूलकारण टोळ्या टोळ्यांनी मोठ-मोठ्या सावजांची शिकार करणे हे होते असे समजतात.त्याच्या तब्बल दहा कोटी वर्षे अगोदर मुंग्यांनी मोठ्या कंपूंनी शिकार करायला सुरुवात केली होती.


शिकारीला मदतनीस म्हणून बारा-तेरा हजार वर्षांपूर्वी माणसाने कुत्र्याला माणसाळवले.


नंतर दुधासाठी,मांसासाठी माणसाळवले गाय, म्हैस,

मेंढी,बकरी.पण मुंगळ्यांच्या कित्येक जाती केव्हाच्याच पशुपालक बनल्या आहेत.गुराखी बिबट्या- लांडग्यांपासून आपल्या गुरांचे रक्षण करतात 


तशाच ह्या मुंग्या वनस्पतींचे अन्नरस शोषणाऱ्या मावे आणि इतर कीटकांच्या शत्रूंना हुसकावून लावतात.

या सेवेच्या मोबदल्यात हे कीटक शोषलेल्या अन्नरसातला काही हिस्सा मधुरसाचे मोठमोठे थेंब काढून,त्यात मुद्दाम जीवनसत्त्वे,अमीनो आम्लांची भर घालून आपल्या रक्षणकर्त्या मुंगळ्यांना पाजतात. 


मानवाच्या शेतीची सुरुवात काही निवडक वनस्पतींना संरक्षण देण्यापासून नऊ- दहा हजार वर्षांपूर्वी झाली.मुंग्यांनी हे पण प्राचीन काळी आरंभले होते.आपल्या बळाच्या जोरावर मुंगळ्यांच्या काही जाती विशिष्ट जातींच्या झुडपांच्या संरक्षणाची जबाबदारी उचलतात.अमेझॉनच्या जंगलात बाभळींच्या काही भाईबंदांचे व मुंग्यांचे असे लागेबांधे आहेत.मुंग्यांच्या ह्या खास जाती बाभळींनी पोकळ काट्यांच्या स्वरूपात पुरवलेल्या निवासांत राहतात.याचबरोबर त्या वनस्पती मुंग्यांसाठी खास अन्न पुरवतात.ह्याची परतफेड म्हणून मुंग्या आपल्या यजमानांवर हल्ला करणाऱ्या किडींपासून,पशूंपासून त्यांचा बचाव करतात.एवढेच नाही तर झुडपाच्या बुंध्याजवळ दुसरी कोणतीही वनस्पती वाढू देत नाहीत. 


पण शेतकरी मुंग्यांचे खास उदाहरण म्हणजे अमेझॉनच्या जंगलातील पानकाप्या मुंग्या. घराच्या एका खोलीएवढ्या प्रचंड वारुळांत ते आसपासच्या वृक्ष-वेलींची पाने तोडून आणून या पानांवर खास जातींची बुरशी जोपासतात.मग त्या बुरशीचा फराळ करतात.ही तर झाली खरी खुरी शेती.ती पण मुंग्यांनी माणसाआधी केव्हाच शोधून काढली होती.


१८ मे २०२३ या। लेखातील पुढील भाग..



१८/५/२३

विल्यम हॅमिल्टन आणि आप्त निवड..

जेबीएस हाल्डेन एका भोजन समारंभात इंग्लंडच्या चर्चचे प्रमुख,कॅन्टरबरीचे आर्चबिशप ह्यांच्या शेजारी बसले होते.धर्मगुरूंनी विचारले, 'हाल्डेनसाहेब,आपल्याला जीवसृष्टीची प्रचंड जाण आहे.मला सांगा,ही जीवसृष्टी निर्मिताना ईश्वराच्या मनात काय होते?' हाल्डेन म्हणाले, 'मी मनकवडा नाही,पण एवढे नक्की - ईश्वराला किडे-मकोडे अतिशय आवडायचे!अहो जगात किड्या- मकोड्यांच्या जितक्या चित्र विचित्र तऱ्हा आहेत,तितक्या दुसऱ्या कोणत्याही जीवकुळीच्या नाहीत!'


हे इतके किडे-मकोडे कसे अवतरले? त्यांना निसर्गात तऱ्हेतऱ्हेच्या भूमिका बजावणे शक्य झाले म्हणून,त्यांच्या छोट्या,काटक,चपट्या शरीरांनी ते जमिनीवरच्या अगणित खाचा-खोचांत राहू शकतात.वाळवीप्रमाणे लाकडापासून,डासांप्रमाणे माणसाच्या रक्तापर्यंत वेगवेगळी संसाधने वापरू शकतात.बहुतांश कीटक एकटे-दुकटे राहतात.पण त्यांतले काही मोठमोठ्या समूहांत राहू लागले.वाळव्या, मुंग्या-मुंगळे,कागद माशा,वाघ माशांसारख्या गांधिलमाशा,मधमाशा,जरी जगातील कीटकांच्या एकूण 


साडेसात लक्ष ज्ञात जातींतील केवळ तेरा हजार जाती समाजशील आहेत.


तरी त्यांची गणसंख्या,त्यांचा एकूण भार, एकांड्या कीटकांच्या कितीतरी पटीने जास्त आहे.टोळी- 'टोळीने शिकार,अळिंब शेती, माव्यासारख्या कीटकांचे जणू काय दुभत्या गाई असे पशुपालन अशा अनेक खुब्यांनी ते यशस्वी झाले आहेत.झाडांची पाने कापून त्यावर बुरशी वाढवून त्यांचा आहार करणाऱ्या ॲमेझॉनच्या वर्षावनातल्या पानकाप्या,ऑट्टा प्रजातीच्या मुंगळ्यांच्या एकेका परिवारात काही अब्ज मुंगळे असतात.


त्यांच्या वस्तीचा आकार दीड मीटर जमिनीत खोल,दोन-तीन मीटर व्यासाचे वर्तुळ एवढा अफाट असतो.त्यांच्यातली एक राणी तब्बल पंधरा-पंधरा वर्षे जगते.आयुष्यभरात अब्ज अंडी घालते.तिच्या मुलीबाळी स्वतःआजन्म ब्रह्मचारी राहतात.त्या सारख्या राबत असतात.त्यांचे आयुष्य केवळ काही महिन्यांचे असते.


अशा श्रमविभागणी केलेल्या,एकमेकांशी घनिष्ठ संबंध असलेल्या संघांत राहणे,ही प्राणि जीवनातली एक महत्त्वाची क्रांती आहे.मुख्य म्हणजे काही खास अपवाद वगळता अशा कीटसंघात एखादीच राणी संतती उत्पादन करते. बाकीच्या श्रमिक माद्या विणीच्या भानगडीत न पडता संघाकरता झटून काम करत राहतात.जर निसर्गनिवडीतून बळकट आत्मसंरक्षण,मुबलक पुनरुत्पादन हीच उद्दिष्टे साधतात,तर मग आजन्म ब्रह्मचारी राहणाऱ्या मुंग्यांची गुणवैशिष्ट्ये पुढच्या पिढीत न उतरल्याने ही प्रवृत्ती तातडीने नाहीशी कशी होत नाही?अशी प्रवृत्ती नाहीशी होत नाही,उलट फोफावू शकते, कारण प्रत्येक जीवाची जडण-घडण हजारो जनुकांच्या आधारावर चालते,आणि वैयक्तिक प्राणी नव्हे तर असे जनुक हेच निसर्गनिवडीचे मूलभूत लक्ष्य आहेत.कोणताही जीव स्वतःचे जनुक आपल्या संततीद्वारे पुढच्या पिढीत उतरवतोच,पण त्याखेरीज तिचे / त्याचे जनुक इतर रक्ताच्या नात्यातल्या आप्तांद्वारेही पुढच्या पिढीत उतरतात.तेव्हा निसर्गनिवडीचा एक भाग स्वत:चा जीव राखणे व स्वतःचे प्रजोत्पादन, ह्याच्या जोडीलाच रक्ताच्या नात्यातल्या आप्तांचे संरक्षण व प्रजोत्पादन हा असणार.


हा आहे निसर्ग निवडीची अधिक फोड करणारा आप्त निवडीचा सिद्धान्त;आणि तो विकसित केला.

इंग्लंडमधल्या हाल्डेनच्याच परंपरेत काम करणाऱ्या विल्यम हॅमिल्टनने.त्याने नेटके गणित मांडून दाखवून दिले की एखादा प्राणी स्वार्थत्याग करेल,पण हात राखून,

केवळ विशिष्ट प्रमाणात.तो एखाद्या भाईबंदासाठी कळ सोसेल, पण जर त्या भाईबंदाला पुरेसा लाभ होत असेल तरच.पुरेसा म्हणजे किती? 


सख्ख्या बहिणीला स्वतः सोसलेल्या हानीच्या दुपटीहून थोडा तरी जास्त लाभ झालाच पाहिजे,

सावत्र बहिणीला चौपटीहून जरा जास्त,चुलत बहिणीला आठ पटीहून जरा जास्त.तसेच मुलीला स्वतः सोसलेल्या हानीच्या दुपटीहून थोडा तरी जास्त लाभ झालाच पाहिजे,आणि नातीला चौपटीहून जरा जास्त.अर्थात जर एकदम चार-चार नातींना लाभ होत असेल तर दरडोई स्वतःच्या हानीइतकाच झालेला पुरे.


हे गणित साऱ्या प्राणिजगताला लागू आहे.मग मुंग्या-मुंगळे,गांधिलमाशा,मधमाशा ह्याच कीटकुलात इतक्या समाजप्रिय जाती का ? हॅमिल्टनने दाखवून दिले की ह्यामागे आहे त्यांची वैशिष्ट्यपूर्ण प्रजननप्रणाली.

सामान्यतः सर्व प्रगत प्राण्यांच्या देहपेशींत जनुकांचे दोन संच असतात एक आईकडून आलेला,एक बापाकडून.

केवळ मादीच्या अंड्यात व नराच्या शुक्रबीजांत ह्या दोन संचांची विभागणी होऊन एकच संच उतरतो.म्हणजे प्रत्येक अंड्यात किंवा शुक्रबीजात आई - बापांचे घुसळून - ढवळून दोघांचेही अर्धे अर्धे जनुक उचलले जातात.म्हणूनच - जनुक संच आई- मुलींत किंवा सख्ख्या भावंडांत निम्मे निम्मे जनुक समान असतात.


पण मुंग्या-मुंगळे,गांधिलमाशा,मधमाशा हे कीटकुल तऱ्हेवाईक आहे.त्यांच्यातले नर असतात बिनबापाचे.ह्या कीटकुलात शुक्रबीजाने फ..लेल्या,नेहमी सारख्या जनुकांचे दोन संच असलेल्या अंड्यांतून फक्त माद्या उपजतात,तर नर उपजतात न फ..लेल्या,जनुकांचे केवळ एक संच असलेल्या अंड्यांतून. ह्या तऱ्हेवाईकपणामुळे एकेका नराची सर्व शुक्रबीजे एकासारखीच एक,आवळी जावळी असतात; त्यांत काहीच वैविध्य नसते.यामुळे सख्ख्या बहिणी-बहिणीत बापाकडून आलेला जनुक संच अगदी सारखा असतो,इतर जीव -जातींप्रमाणे आईकडून आलेल्या जनुक संचात मात्र सरासरी अर्धे जनुक एकासारखे एक असतात.परिणामत: बहिणी-बहिणींत तीन-चतुर्थांश जनुक एकासारखे एक असतात, तर माय-लेकींत इतर जीवजातींप्रमाणे अर्धे. ह्याचाच अर्थ असा की आप्त निवडीच्या भाषेत आपल्या स्वतःच्या मुलींपेक्षाही बहिणींसाठी स्वार्थत्याग करणे शहाणपणाचे ठरते.हे आहे मुंग्या-मुंगळे,गांधिलमाशा,मधमाशा ह्याच कीटकुलांत इतक्या मोठ्या प्रमाणात समाजप्रिय जातींची उत्क्रान्ती होण्याचे रहस्य.


'हा मुंग्यांचा लोंढा आला,' मर्ढेकर म्हणतात, 'सहस्र जमल्या,लक्ष कोटिही,अब्ज अब्ज अन् निखर्व मुंग्या !' उत्क्रान्तीच्या पुराणातला ह्या अगणित समाजप्रिय कीटकांचा अध्याय हा वारूळ पुराणातल्या रॅफ ह्या नायकाच्या विद्यार्थिदशेतल्या प्रबंधाचा गाभा आहे. खरोखरच जगात वारेमाप मुंग्या आहेत. आफ्रिकेच्या माळरानात दर हेक्टरी पाच कोटी मुंग्या-मुंगळे सापडतात.हेच प्रमाण भारताला लावले,तर आपल्या देशात दहा हजार निखर्व- एकावर पंधरा शून्ये- इतक्या मुंग्या असायला पाहिजेत.इतक्या नाहीत,तरी शे-दोनशे निखर्व असतीलच असतील,म्हणजे 


प्रत्येक माणसामागे दहा कोटी.


समूहप्रिय किड्यांच्या ह्या वैपुल्याचे मूळ त्यांच्या स्वार्थत्यागी श्रमिकांच्यातल्या एकीच्या बळात आहे.

एकजुटीमुळे संघप्रिय कीटक एकांड्या कीटकांवर अनेक बाबतीत मात करू शकतात. संघर्षाचा प्रसंग आला तर एक-एकटे राहणारे कीटक जिवाला सांभाळून झगडतात.

कारण त्यांचे एखादे तंगडे तुटले की सगळेच संपले.पण समूहशील कीटकांना वारुळातल्या हजारोंपैकी दोन- चारशे मारल्या गेल्या तरी खपवून घेता येते.अशा संघशक्तीचा फायदा मिळून ('वारुळ पुराण',माधव गाडगीळ',ई.ओ.विल्सन,अनुवाद - नंदा खरे,मनोविकास प्रकाशन )


निसर्गातल्या टिकाऊ,उत्पादक संसाधनांवर मुंग्या मधमाशा- वाळव्या आपली निरंकुश सत्ता गाजवतात.उलट एकांड्या कीटकांना क्षणभंगुर, निरुत्पादक,अविश्वसनीय संसाधनांवर गुजराण करायला लागते.पण अशी कमी प्रतीची संसाधने नाना तऱ्हेची आहेत.याचा फायदा घेत,एकाकी कीटकांचे वैविध्य समाजप्रिय कीटकांच्या कितीतरी पट फोफावले आहे.वैविध्य आणि वैपुल्य यांचे असे उलटे नाते आहे.