* विजय गायकवाड | Vijay Gaikawad

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

१/७/२३

मी माझ्यासोबत केलेला प्रवास.. भाग ४

एक सत्य घटना आहे.कोलंबसन अमेरिकेचा शोध घेण्यासाठी मोठ्या सफरीला निघाला.जहाजावर त्यांनी

तीन महिन्याचे धान्य-पाणी घेतले. इतकेच नव्हे तर काही कबुतरेही त्यांनी आपल्यासोबत घेतली.या प्रवासात त्याला कुठेही जमीन किंवा एखाद्या बेटाचा तुकडाही दृष्टीपथास पडला नाही.सगळीकडे फक्त पाणीच पाणी.एके क्षणी प्रवासात सोबत घेतलेले सगळे अन्न-धन्य संपायला आले.शेवटी तर केवळ तीन दिवसांचा शिधा तेवढा उरला.


रोज सकाळी कोलंबस कबुतरांना आकाशात उडवायचा पण कुठेही जमीन नसल्यामुळे कबुतरे पुन्हा बोटीवर परतायची.जेव्हा कबुतरे परतायची, तेव्हा कोलंबस खूप उदास व्हायचा. सभोवताली फक्त अथांग समुद्र-पाणीच पाणी. तो दिवस असाच गेला.दुसऱ्या दिवशी कुठेतरी किनारा मिळेल म्हणून त्याने आपली कबुतरे आकाशात सोडली पण याही वेळेला कबुतरे परत जहाजावरच परतली.


तीन महिन्यात एखादा जमिनीचा तुकडा देखील दृष्टिपथात दिसलेला नव्हता.आता तर सगळेच अन्न-धान्य,पाणी संपून गेले होते.बरं परत फिरावं म्हटलं तर ते शक्य नव्हते.तिसर्‍या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे कोलंबसने आपली कबुतरे आकाशात सोडली.कबुतरे चारही दिशांना पांगली.मुख्य म्हणजे बराच वेळ झाला तरी परतली नाहीत.कोलंबसला आशेचा मोठा किरण दिसला. तीन-चार तास झाले तरी कबुतरे परत यायची काही चिन्हे दिसेनात.तेव्हा कोलंबसच्या डोळ्यात पाणी उभे राहिले. तो सहकाऱ्यांना म्हणाला,'इतक्या दिवसांच्या प्रवासाचे-मेहनतीचे फळ आपल्याला मिळते आहे.ज्याअर्थी कबुतरे परत फिरली नाहीत,त्याअर्थी आसपास इथेच कुठेतरी जमीन आहे.कोलंबसच्या साथीदारांच्या डोळ्यात पाणी आले.अखेरीस त्यांना किनारा दिसला.कोलंबससह सगळे साथीदार आनंदाने नाचू लागले.एकमेकांना मिठ्या मारू लागले.


बघितलं ? तुमच्या मनात जर विश्वास असेल तर काय अशक्य आहे ? तुम्हाला एक ना एक दिवस सफलता मिळणारच फक्त तुम्ही पुढे जात राहिले पाहिजे.

कारण या प्रवासातच या प्रवासाची सांगता असते.



दुसऱ्या दिवशी आदरणीय रामराव गायकवाड साहेब यांच्या घरी मी रामराव बोबडे,शरद ठाकर सर,माधव गव्हाणे सर जेवायला गेलो.( रात्रीचे जेवन आदरणीय विष्णु मोरे साहेब गटविकास अधिकारी यांच्यासोबत झाले.) कौटुंबिक वातावरणात,आनंदात तृप्त जेवण झाले.मी माधव गव्हाणे साहेबांच्या जि.प.प्रा.शाळा,रायपूर या त्यांच्या शाळेकडे जाणार होतो.या शाळेमध्ये शिक्षण घेत असणारे वैष्णवी,तनुष्का,सोहम,आर्यन,आदर्श,मोहन हे विद्यार्थी भन्नाट कविता करतात.निसर्गाचे, सभोवताली असणाऱ्या परिस्थितीचे,लोकांचे सूक्ष्म निरीक्षण करतात. व ते कवितेद्वारे प्रकट होतात.खूपच प्रभावी कविता असतात.


'गुरु चौकस शिष्याच्या प्रश्नांना योग्य दिशा व दृष्टी देतो.असे बुध्द म्हणतात.' 


हे सत्य मी प्रत्यक्ष आज पाहणार होतो. त्या शाळेला विद्यार्थ्यांना,शिक्षकांना,त्या गावातील ज्येष्ठ नागरिकांना,

आदर्श पालकांना भेटण्याची ओढ मला लागली होती.

'तळमळ म्हणजेच शिक्षण' ही तळमळ मला लागली होती.आम्ही दोघेही निघालो.कार्यालयामध्ये जाऊन येथील मुख्याध्यापक काळे सर,सर्व शिक्षक आणि गावातील मान्यवरांसोबत चर्चा केली.संवाद साधला मग मी त्या विद्यार्थ्यांना भेटण्याकरिता त्यांच्या वर्गाकडे निघालो.भेटीची उत्सुकता होतीच.


वर्गामध्ये जाताच माझ्यावरती फुलांचा,फुलांच्या कळ्यांचा वर्षाव करण्यात आला.शाळेतील या विद्यार्थ्यांचे निखळ प्रेम पाहून मी हवालदिल,भावनिक झालो.माझं हरवलेलं

बालपण एवढ्या 'मोठ्या' रुपात मला भेटलं. मी नवीनच शाळेत प्रवेश घेतला व एवढे हुश्शार सवंगडी मला लाभलीत याचा मला फार अभिमान वाटतो.थेट व मोकळ्या मनाच्या या मुलांच्यामुळे मला जीवनाची नव्याने ओळख झाली.


ही मुलं म्हणजे निसर्गातील निरागस रुपातील फुलेचं..


पालक आले त्यांच्याशी मुलांच्या अभ्यासातील प्रगतीबद्दल बोललो.शिक्षक स्वतःची लेकरं म्हणून शिक्षण देतात.या शिक्षकांचे आम्ही मनापासून आभारी आहोत.

अशी कृतज्ञता त्यांनी व्यक्त केली.आमच्या लेकरांना व शिक्षकांना या शाळेला पण भेटण्याकरिता आला याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत.असं बोलण्यासही ते विसरले नाहीत.शाळेच्या पटांगणात विद्यार्थ्यांना शिक्षण,शिक्षक,पुस्तकाचे मूल्य,आई वडिलांचे जीवनातील स्थान,यशस्वी होण्यासाठी कष्टाला पर्याय नाही.अशा सर्व विषयांवर मी त्यांच्याशी सुसंवाद साधला. कार्यक्रम संपल्यानंतर मुलांनी माझी मुलाखत घेतली.

त्यांची प्रश्न भन्नाट होती.सर आपल्या आवडते पुस्तक कुठले?आपला आवडता मित्र कोणता त्याच नाव काय?तुम्ही आतापर्यंत किती पुस्तके वाचली आहात?सर आपण लहानपणी खेळत होता का?खेळत होतात तर कोणकोणते खेळ खेळत होता?सर आपण पुढील शिक्षण का घेतले नाही?हा प्रवास आपला कसा झाला? तुम्ही आम्हाला भेट म्हणून दिलेले पुस्तक 'कुणाला सांगू नका' हे मी नक्की वाचू व जीवनात यशस्वी होऊ असं त्यांनी मला मनापासून सांगितलं.


लक्ष्मण गाडेकर तात्या,काही पालक आणि विद्यार्थ्यांच्या सोबत गावात लोकवर्गणीतून उभा केलेला सभामंडप,

ऐतिहासिक अशी यादव कालीन 'बारव' आम्ही

सर्वांनी पाहिली व त्यांच्यासोबत खूप सार्‍या गप्पा झाल्या.त्यांच्या आयुष्यातील चढउतार,यशाचे शिखर यावर मनोसक्त बोललो.सर्वाचा मनापासून निरोप घेवून आम्ही रायपूर पासून अंदाजे १० ते १२ किलोमीटर अंतरावर असणाऱ्या चारठाणा या ठिकाणी जाण्यासाठी पुढील प्रवास सुरू केला.


या ठिकाणी माधव गव्हाणे सरांचे मार्गदर्शक, मनमिळाऊ स्वभावाचे नारायण गडदे सर आमची आनंदाने वाट पाहत होते.साहित्य,काव्य,पुस्तके,वाचन,शाळा हेच मंदिर,या आवडीच्या विषयावर प्रसन्न मनाने ते बोलले.त्यानंतर भाऊसाहेब कोकरे सर,सकनूर सर आम्हाला येऊन भेटले.आम्ही सर्वजण पुढील प्रवासासाठी निघालो.


चारठाणा किंवा चारठाणे हे महाराष्ट्रातील परभणी जिल्ह्याच्या जिंतूर तालुक्यातील गाव आहे.येथे प्राचीन मंदिरे आहेत.इसवी सनाच्या ११ व्या ते १२ व्या शतकात म्हणजेच देवगिरीच्या यादव राजांच्या काळापासून या गावाचा इतिहास आहे.या काळात येथे हेमाडपंती पद्धतीची मंदिरे बांधली गेली.येथे हैद्राबाद मुक्ती संग्रामातील काही घटना घडल्या होत्या.


येथील अनेक मंदिरांपैकी काही मंदिरे अद्याप शिल्लक आहेत.

१) गोकुळेश्वर महादेव मंदिर

२) जोड महादेव मंदिर

३) खुराची देवी मंदिर

४) उकंडेश्वर महादेव मंदिर

५) दीपमाळ / मानसस्तंभ

६) गणपती मंदिर

७) गोद्रीतील महादेव मंदिर

८) ऋतुविहार (पांढरीतील मंदिर ) ( सध्या अवशेष शिल्लक )

९) नरसिंह तीर्थ मंदिर


ही मंदिरे दगडी बांधकामाची आहेत.गावात गोकुळेश्वर मंदिराजवळ पुष्करणी तीर्थ बारव असून आज देखील तिला पाणी उपलब्ध आहे. या मंदिराच्या दक्षिणेस एक विश्रामधाम असून याच्या भिंतीत भुयारी मार्ग आहे.


चारठाणा हे जवळपास १० हजार लोकसंख्येचे गाव असून औरंगाबाद-नांदेड या मार्गावर मंठा ते जिंतूर या दरम्यान आहे.जिंतूर ते चारठाणा हे अंतर १८ किमी आहे. हे पाहत असताना  


"आपण स्वतःला जसे समजतो तसे बनतो. आपल्या विचारानुसार आपले वर्तन असते, आणि आपल्या आसपासचे जगही त्यानुसारच घडते.- गौतम बुद्ध " 


 पुस्तकातील या वाक्याची प्रखरपणे आठवण झाली.ती सर्व मंदिरे पहात असताना आमचे आदरणीय परम मित्र माधव गव्हाणे साहेबांनी  या वास्तू कल्पकतेच्या अनुषंगाने एक घटना सांगितली.


६ जून १६७४ या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा पार पडला.

या दिवशी सूर्य नगारखान्याच्या कमानीतून उगवला होता.आणि त्याचे पहिले किरण सिंहासनावर पडले होते. मध्यान्हाच्या वेळी सूर्य सरळ सिंहासनाच्या चौथऱ्यावर सूर्य येणार होता.असे भौगोलिक महत्व लक्षात घेऊनच ६ जून १६७४ ही तारीख ठरवण्यात आली असावी असे वाटते.त्या दिवशीचा सूर्याचा मार्ग समजून घेण्यासाठी  solar path app च्या मदतीने आजही शोधून काढता येते.

      -मिलिंद पराडकर (दुर्ग अभ्यासक)


 माझ्यासाठी हे खूपच नाविण्यपूर्ण होतं या माहितीबद्दल व सर्व आदरणीय मित्रांनी वेळ काढून आम्हाला ही ऐतिहासिक कलाकृती,इतिहास,शौर्य,पराक्रम,

कलात्मकता,दाखविल्याबद्दल त्यांचा पाहुणचार घेऊन आभार मानून ही भेट अपूर्ण ठेवून परतीचा प्रवास सुरू केला.संध्याकाळी ६.३० वाजता मगर सरांच्या गच्ची वरती वाचन संस्कृती,वाचनाचे जीवनातील स्थान,वाचणामुळे घडलेला माणूस,वाचनामुळे बदलला जाणार दृष्टीकोण या विषयावर सुसंवादाचा कार्यक्रम ठेवला गेला होता.अनेक तज्ञ,सामाजिक कार्य करणारे,सर्वांचं भलं व्हावं ही तळमळ मनात बाळगणारे शिक्षक,वाचक प्रेमी,संस्थापक अशी सर्वजण एकत्रित आली होती.मी माझा पुस्तकाचा प्रवास माणसापासून माणसांपर्यंतचा प्रवास सांगितला.

कोल्हापूरहून परभणीला फक्त माझ्या लोकांना माझ्या मित्रांना भेटण्याकरता केला आहे.असं सांगितलं या लोकांनी दिलेले प्रेम मान,सन्मान,आदर,आपुलकीने

मी भारावून गेलो.सद्गदित झालो. माझा पुस्तक प्रवास मी थांबवला.मी भरपूर बोलणं अपेक्षित होतं.पण त्या ठिकाणी मला थांबण महत्वाचं होतं.म्हणून मी थांबलो संध्याकाळी आदराचं भोजन रामराव बोबडे सर यांच्या घरी झालं.मनोहर गायकवाड,भारीच भोईते सर,गोलू पटवारी ( गोड बोलतात म्हणून साखर सम्राट ) यांची विशेष भेट आनंद देवून गेली.भोजनानंतर अनेक विषयावर चर्चा झाली.सर्वांच्या भेटी घेऊन शरद ठाकर सरांच्या घरी विश्रांतीसाठी गेलो.


कोल्हापूरला परत येण्याची गडबड सुरु झाली.मला परभणीला सोडण्यासाठी रामराव बोबडे,रामराव गायकवाड,माधव गव्हाणे हे आले होते.परभणीमध्ये आचार्य ग्लोबल अकॅडमीचे मनोहर सुर्वे यांनी माझ्या निरोप समारंभाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या ठिकाणी अनेक मान्यवर हजर झालेली होती. प्रत्येक व्यक्तीने आपलं मनोगत व्यक्त केले.माझं ह्रदय भरुन आले.विठ्ठल भुसारे साहेब यांनी 'तुफानातील दिवे' गीत म्हणून दाखविले. संध्याकाळचे जेवण साहेबांच्या घरी करून शर्मा ट्रॅव्हल पर्यंत पोहच करण्यासाठी साहेबांनी आपली गाडी दिली.सुभाष ढगे,माधव गव्हाणे, रामराव गायकवाड,रामराव बोबडे प्रचंड थंडी असूनही मला निरोप देण्यासाठी आली होती. माझे तर डोळे आणि मन भरुन आले होते. मी फक्त बसच्या काचेतून त्यांच्याकडे पाहत होतो.नि:शब्द होऊन.शेवटी काहीही झालं तरी सर्व भावना शब्दात व्यक्त करता येत नाही.शब्द अपुरे पडतात.पण ज्यावेळी शब्द अपुरे पडतात. त्यावेळी संपूर्ण जीवन जगण्याचा मार्ग आपल्याला सापडलेला असतो.सर्वांचे मनःपूर्वक आभार व धन्यवाद काही घटना व प्रसंग राहिलेले असू शकतात.


समाप्त .. २०२१ साली केलेल्या प्रवासाचे वर्णंन..


एकदा एका माणसाने आपल्या घराचं नूतनीकरण करायला सुरुवात केली.असे करतना भिंत तोडून उघडायला लागते.जपानी घरांच्या भिंती लाकडाच्या बनवलेल्या असतात.आणि त्यांत सहसा पोकळी असते.

तर,ही भिंत तोडताना त्या माणसाच्या असं लक्षात आलं की आतमध्ये एक पाल अडकून पडली आहे आणि भिंत सांधताना मारलेल्या एका खिळ्यात तिचा एक पाय चिणला गेला आहे.त्याला त्या पालीची अवस्था पाहून खूप दया आली आणि त्याचं कुतुहलही जागृत झालं,की हा खिळा जवळपास ५ वर्षां पूर्वी हे घर नवीन बांधलं

तेंव्हा ठोकला गेला होता.मग ५ वर्ष पाय चिणलेल्या अवस्थेत ही पाल जिवंत कशी राहिली असेल? असं काय घडलं होतं की त्या अंधार असलेल्या पोकळीत हालचाल न करता ती पाल जिवंत कशी रहिली? जे जवळ जवळ अशक्य होतं त्यानं त्याचं काम अक्षरशःथांबवलच आणि तो त्य पालीवर लक्ष ठेवून बसला,की ती आता कशी,काय खाते? काही वेळाने पाहता पाहता त्याला दिसले की तेथे दुसरी पालही आली आहे.आणि तिच्या तोंडात अन्न आहे आणि ती हळूहळू त्या खिळलेल्या पालीला ते अन्न भरवत आहे. हे पाहून तो माणूस अवाक झाला,गहिवरला.


कल्पना करा १ नाही,२ नाही तर ५ वर्ष न कंटाळता एक पाल आपल्या जोडीदाराची अशी सेवा करते,अजिबात आशा सोडून न देता.एक पाली सारखा नगण्य प्राणी आपल्या प्रिय जोडीदाराला सोडुन न जाता त्याची अशा प्रकारे काळजी घेतो,तर आपण माणसं यांपासून काही तरी नक्कीच शिकू शकतो.तेंव्हा,अडचणीत असलेल्या

आपल्या जवळ्च्या प्रिय व्यक्तीला नेहमी आधार द्या जेंव्हा तिला तुमची खरोखरच गरज असते,तेंव्हा. "तुम्ही" म्हणजे त्या व्यक्तीसाठी संपूर्ण दुनिया असू शकता.कोणतीही गोष्ट

(नातं,विश्वास) तुटण्यासाठी एक क्षणाचं दूर्लक्ष पुरेसं असतं,परंतु जोडण्यासाठी अख्खं आयुष्य पणाला लावावं लागतं. गोष्ट संपली.

अज्ञात..



२९/६/२३

मी माझ्यासोबत केलेला प्रवास..

'एक वैश्विक नियम आहे,तो असा ! जो शोधेल त्याला सापडेल आणि जो दार वाजवेल,त्याच्यासाठी ते उघडले जाईल.! कारण केवळ संयम,अभ्यास आणि अथकपणे केलेला पाठपुरावा यांच्या सहाय्यानेच माणूस ज्ञान मंदिराच्या प्रवेशद्वारातून आत जाऊ शकतो.!


खरंच हे ज्ञानच होतं मला समजून घेण्याचं कारण "आपण जसा विचार करतो, तसेच आपण असतो." हे जेम्स ॲलनचे सूत्र मूलगामी व सर्वव्यापी आहे आणि ते माणसाच्या संपूर्ण अस्तित्वाला व्यापून उरते.


यातही हे सर्वसमावेशक सूत्र आपल्या मनावर सतत अधिराज्य गाजवत असते.माणसाच्या आयुष्यातील प्रत्येक स्थिती आणि प्रसंग यांना विचार सहज स्पर्श करू शकतात,एकूणच माणूस म्हणजे अक्षरशः त्याचे विचारच असतात. यातही त्याचे व्यक्तित्व हे त्याच्या विचारांची गोळाबेरीज असते.असे म्हटले, तर ते अतिशयोक्त ठरू नये." हा पुस्तकातील उतारा मला जीवन जगण्यासाठी उपकारक ठरला.


दुसऱ्या दिवशी परभणीमध्ये कृषी विद्यापीठाच्या आवारात अनेक प्रकारची पक्षी येतात त्यांचे निरीक्षण करण्यासाठी आपल्याला लवकर जायचं आहे असं आदल्या रात्री आमचं ठरलं होतं.मी तर तयारच होतो. दुसऱ्या दिवशी सकाळी ५.०० ते ५.३० वाजता आम्ही कृषी विद्यापीठाच्या आवारात जाऊन अनेक प्रकारचे पक्षी त्यांचे निरीक्षण केले.त्या पक्षांचे वैशिष्ट, त्यांचा आवाज,

त्यांचे राहणीमान,त्यांचे घरटे,ते बांधण्यासाठी आवश्यक असणारे झाड झाडावरील फांदी अशा अनेक वैविध्यपूर्ण, नाविन्यपूर्ण माहितीद्वारे माझ्या ज्ञानामध्ये खूपच नवीन वाढ झाली.


निसर्गाशी माणसाचं असणारं नातं हे जन्मोजन्मीच आहे.हे सत्य मला याठिकाणी सापडलं.निसर्ग माणसाशिवाय राहू शकतो पण माणूस निसर्गाशिवाय राहू शकत नाही.


आमचे परममित्र सुभाष ढगे साहेब हे ९.०० वाजता त्यांच्या महाविद्यालयाकडे जाणार होते. त्यांच्याकडे मला सोपवुन माणिक पुरी साहेबांना त्यांच्या शाळेकडे रवाना व्हायचे होते.आम्ही बरोबर नऊ वाजता महाविद्यालयात पोहोचलो. सुभाष ढगे साहेब म्हणाले माझा माझा तास आहे.मी येतो तोपर्यंत तुम्ही इथेच थांबा तोपर्यंत शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय कुलकर्णी साहेब समोरून आले.त्यांची ओळख झाली व आम्ही कार्यालयात गेलो.

तिथे थोडी चर्चा झाल्यानंतर मी माझ्यासोबत घेऊन गेलेलो. 'कुणाला सांगू नका' हे पुस्तक भेट दिले.तोपर्यंत डॉ.संजय आश्रोबा मोरे जीवशास्त्र प्राध्यापक त्यांची व माझी भेट झाली.आम्ही दोघेही महाविद्यालय बघण्यास गेलो.ते मला आपल्या बैठक खोलीमध्ये घेऊन गेले.त्या ठिकाणी त्यांची व माझी शिक्षण या विषयावर विस्तृत चर्चा झाली.त्याच्या खोलीमध्ये माणसाचा खरा सांगाडा होता.ते म्हणाले मी याच्याशी बोलतो संवाद साधतो.मला आश्चर्य वाटलं. मी शहारलो कारण सरांनी मला नकळत एक नवीन जीवनतत्व शिकवलं होतं.मी त्याच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला.मला असं जाणवलं की तो सांगाडा मला सांगत होता.तू नेहमी फिरत रहा इतरांना आपलं करत राहा.त्यांच्याशी मनापासून सुसंवाद साधत रहा‌ 'मेल्यानंतर आपल्याला भरपूर झोपायचं आहे आता तरी जागे राहा.' हे बेंजामिन फ्रेंकलिंन यांच्या वाक्याची मला प्रकर्षाने आठवण झाली. मी भेटेल त्या व्यक्तीशी संवाद साधत होतो. त्यांच्याशी जिवाभावाचं बोलत होतो


सुभाष ढगे साहेब आल्यानंतर त्यांनी माझी इतरांसोबत ओळख करून दिली.आमची वाचन, पुस्तकाचं जीवनातील महत्वाचे स्थान या विषयावर प्रदीर्घ चर्चा झाली.याचदरम्यान साहेबांनी 'महाराष्ट्राला माहीत नसलेले सम्राट शिवाजीचे लेखक डॉ. आनंद पाटील साहेब कोल्हापूर यांच्याशी फोनवर संवाद साधला.त्यानंतर डॉ. नितीन शिंदे इस्लामपूर सफर विश्वाची या पुस्तकाचे लेखक यांच्याशी संवाद झाला. साहेबांनी घरातून जेवणाचा डबा आणला होता.आम्ही तिथेच सोबत बसून तो खाल्ला. साहेबांना नातेवाईकांच्या विवाह समारंभांमध्ये जायचं असल्याकारणाने त्यांचे सहकारी मित्र शेवाळे सरांना सांगितले.तुमच्याकडे एक महत्त्वाची जबाबदारी देत आहे.हे आमचे मित्र विजय गायकवाड कोल्हापूरहून आम्हाला भेटण्यासाठी आलेले आहेत.यांना सुरक्षित 'विठ्ठल भुसारे साहेब'(उपशिक्षणाधिकारी) परभणी याच्यांकडे सोडून यायचे.'रोज' हॉटेल समोर गेल्यानंतर विजयराव साहेबांना फोन लावतील.तुम्ही लवकरच त्यांना घेऊन जा साहेबांचा फोन आला होता.

आम्ही रोज हॉटेलच्या समोर गेलो.साहेबांना फोन लावला साहेबांनी त्यांच्या कार्यालयाकडे घेऊन येण्यास सांगितले.कार्यालयात गेल्यानंतर तुफानातील दिवे शिक्षण क्षेत्रातील 'विठ्ठल' शिक्षणाबद्दल तळमळ,कळवळा,ध्यास,

असं सर्वसमावेशक,विस्तृत,धबधब्यासारखं खळखळणारं व्यक्तिमत्व काही थोड्या अंतरावरच खुर्चीमध्ये विराजमान होतं.मास्क घातला होता.मला या भेटीची उत्कंठा होती.हा राम व भरत यांचा मिलाफ होता. क्षणाक्षणाने मी या भेटीच्या ओढीने स्वतःमध्ये उत्क्रांत होत होतो.एकमेकांची नजरानजर झाली. मनाची मनाला खूणगाठ पटली.आणि त्या ठिकाणी उच्च असा पारलौकिक अध्यात्मिक संगम झाला.इतका आनंद झाला.जणू तो माझ्यासाठी पुनर्जन्म सोहळाच होता.प्रवास कसा झाला.काय त्रास झाला नाही ना.अनेक विषयावरती आपुलकीने,प्रेमाने सुसंवाद झाला. साहेब मला म्हणाले विजयराव आज दिवसभर फक्त तुम्ही माझ्यासोबत गाडी मध्ये बसून राहायचं.व माझ्या सोबत फिरायचं.माझ्यासाठी ती आनंदाची पर्वणी होती.आम्ही तातडीने नावकी या शाळेच्या आनंता भुसारे या शिक्षकांचा विवाह तरोडा जि. परभणी या ठिकाणी होणार होता.साहेब पोहोचल्या नंतरच अक्षता पडल्या साहेबांनी वधूवरांना शुभ आशीर्वाद दिले.साहेबांच्या मनाचा इतका मोठेपणा मला जवळून अनुभवास मिळाला. प्रत्येक ठिकाणी ते न चुकता माझी ओळख करून देत होते.मला महान बनवत होते.कारण महान व्यक्तीच लहान लोकांना महान करतात. जवळच असणाऱ्या शाळेला साहेबांसोबत भेट दिली.त्यानंतर जेवण करून आम्ही राजयोग मंगल कार्यालय परभणी याठिकाणी जाधव राठोड यांच्या विवाह स्थळी भेट देऊन सर्वांना भेटून स्नेह भोजन झाल्यानंतर गिरगाव या गावाकडे रवाना झालो.


संध्याकाळी ७.०० वाजता आम्ही परभणी मध्ये परत आलो. मी साहेबांसोबत आठ तास होतो. त्यांना मी जवळून अनुभवलं,त्यांचं निरीक्षण केलं. व मी थक्क झालो.


"प्रत्येक व्यक्ती हा ग्रंथ असतो.फक्त तो आपणास वाचता आला पाहिजे."


आम्हा सर्वांना एका सूक्ष्म अशा प्रेमाच्या धाग्यामध्ये एकत्रित करून नवीन नाती निर्माण करणारं व्यक्तिमत्त्व,माणसांना जोडणारा मानवी संवेदनशील मनाचा मानवी सेतू,ज्यांना त्यांचे सहकारी मित्र प्रेमाने भविष्य म्हणतात असे आमचे आदरणीय मित्र माधव गव्हाणे साहेबांचा फोन येत होता.उद्या लवकर निघा..! विठ्ठल भुसारे साहेबांनी उद्याचं जेवण आमच्या घरी असा प्रेमपुर्वक मोठ्या मनाने निरोप घेतला. व सुभाष ढगे यांच्या घरी जेवण करून माणिक पुरी साहेबांच्या घरी विश्रांतीसाठी आलो.


२७ जून २०२३ या प्रवासातील पुढील प्रवास,

प्रवास पुढे सुरुच आहे,तो पुढील लेखामध्ये..


विजय कृष्णात गायकवाड 





२७/६/२३

मी माझ्यासोबत केलेला प्रवास,भाग २

माणिक पुरी साहेबांसोबत त्यांच्या निवासस्थानी गेलो.मी शाळा सोडली आहे पण शाळेने मला अजून सोडलेले नाही.याठिकाणी निवासी शाळा आहे.रणजीत पुरी सर,

किरण पुरी सर,या दोन भावांसोबत ही शाळा मोठ्या संस्कारशील पध्दतीने चालवली जाते.शिक्षण,शिक्षणाप्रती ओढ,विद्यार्थ्यांप्रती तळमळ दिसुन आली.सुट्टी सुरु असल्याने विद्यार्थ्यांशी सुसंवाद घडू शकला नाही.

आवरल्यानंतर सात्विक  जेवण करून संतुष्ट झालो. इतक्या वेळेत आचार्य ग्लोबल अकॅडमीचे संस्थापक आमचे जेष्ठ बंधूच जणू आम्हाला घेऊन जाण्याकरिता आले.गळाभेटी भेटी झाल्या.मी व माणिक पुरी साहेब त्यांच्यासोबत त्यांच्या शाळेला भेट देण्यासाठी व त्याचबरोबर विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधण्यासाठी गेलो.

मुलांची घरी जाण्याची वेळ संपत आली होती.तरीही आम्ही आलो आहोत म्हटल्यानंतर मुलांना फुलणार्‍या फुलांसारखा आनंद झाला.खरंच त्या शाळेचं ब्रीद वाक्य आहे. " माणसं घडवणारी शाळा" मी बारकाईने निरीक्षण केलं.


"औपचारिक शिक्षण असो वा नसो तरीही जोपर्यंत प्रत्येकाचं बोलणं गांभीर्याने ऐकून घेतलं जातं,तोवर प्रत्येकाने त्यात दिलेलं योगदान भरीवच असतं हे संशोधकांनी पुन्हा पुन्हा सांगितलं आहे." याचा अनुभव प्रत्यक्ष अनुभवला.


तेथील वातावरण झाडे निसर्गरम्य परिसर शिक्षकांची शिकवणारी तळमळ,विद्यार्थ्यांचे भविष्य उज्वल असावं,यशस्वी आयुष्याचे ते माणकरी असावेत.ही भावना मला त्यांच्या वागण्यातून त्यांच्या विनम्र स्वभावातून जाणवली. 


मुलांसोबत शिक्षण शिक्षणाचे मूल्य, परिस्थितीकडे बघण्याचा दृष्टिकोन,यशस्वी होण्याचा मार्ग कष्टातून जातो.

अशा सर्व जीवनाला स्पर्श होणाऱ्या गोष्टी बाबत मी त्यांच्याशी सुसंवाद साधला.मी त्यानंतर माझ्या सोबत आलेले निसर्गप्रेमी व प्राणी अभ्यासक माणिक पुरी साहेबांना बोलण्याची विनंती केली. त्यांनीही निसर्गाच्या पशुपक्ष्यांच्या प्राण्यांच्या जगण्याच्या आश्चर्यकारक गमती जमती सांगत. एक नैसर्गिक वातावरण निर्माण करण्यात भर घातली.वेळ थोडा होता मुलांना भूक लागली होती.

त्यामुळे वेळेचे भान ठेवून त्यांना घरी जाण्यास सांगितले.

आम्ही शाळा,शाळेचा परिसर,शिक्षणाची पद्धत,वाचनालय अनेक गोष्टी पाहिल्या.मला तर ही माझीच शाळा वाटली. त्यांनी केलेला पाहुणचार मनापासून दिलेला सन्मान या गोष्टी माझ्यासाठी भावनिक पातळीवर खूप महत्त्वाच्या होत्या.ही अपूर्ण भेट आहे तशी स्थिर ठेवून आम्ही त्यांची परवानगी घेऊन निरोप घेतला.व पुढील भेटीचे नियोजन केले.


जिथे मुक्तता असते,तिथे स्वातंत्र्य असतेच,असे बील आयर्स,अमेरिकन शिक्षण तज्ञ म्हणत असे. हे स्वतंत्र घेऊन मी पुढील प्रवासाला निघालो.


'दुसऱ्यातल्या चांगल्या मूल्यांना व गुणांना आपल्याला चांगले म्हणता आले पाहिजे.त्यांना आपल्याला मनापासून दाद देता आली पाहिजे. - व्हॉल्तेर' यांच्या वाक्याची पुनरावृत्ती मी परभणी मध्ये पावलोपावली भेटेल त्या व्यक्तीकडून शिकत होतो स्वतःला रुपांतरीत करत होतो. 


त्यानंतर आमचे परममित्र सुभाष ढगे साहेब यांच्या घरी मला सोडून माणिक पुरी सर ऑनलाइन कार्यक्रमामध्ये समाविष्ट झाले.


सर्व लोकांमध्ये असणारी एकसमनता माझ्या मनाला भावली.या सर्व व्यक्ती सर्वश्रेष्ठ व महान आहेत.

प्रत्येक व्यक्ती कोणत्या ना कोणत्या जबाबदार पदावर कार्यान्वित आहे.त्यांचं दिवसाचं व्यस्त वेळापत्रक ठामपणे ठरलेलं आहे.तरीही त्यांनी मी एकटा राहू नये म्हणून माझ्या काळजी पोटी अतिशय काटेकोरपणे वेळापत्रक केले होते.प्रत्येक व्यक्ती ठराविक वेळी ठराविक ठिकाणी मला पुढील ठराविक जबाबदार व्यक्तीकडे अलगत पोहोच करीत होती. 


सरांच्या घरी विश्रांती घेतली राहिलेल्या अपूर्ण भेटी पूर्ण करत गेलो.थोड्याच वेळात आनंदी व्यक्तिमत्व जाधव साहेब आले.त्यानंतर डॉ. संजय मोरे सर आले.थोडीशी चर्चा झाली प्रवास करून आल्यामुळे विश्रांती मिळावी म्हणून जाधव सरांच्या घरीच थोडी विश्रांती घेतली.

त्यानंतर संध्याकाळी माणिक पुरी साहेबांच्या सोबत "आसाराम लोमटे (साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक) कवीमित्र हनुमान व्हरगुळे संत साहित्याचे अभ्यासक अनिल स्वामी अशा अभ्यासु व आकर्षक व्यक्तिमत्त्वांच्या सोबत दोन तास आनंदी वातावरणात घालवले.



दोन तासांमध्ये घेण्यासारखे मला भरपूर मिळाले.

"अस्तित्वात असणे म्हणजे संबंधात असणं हे मला आतुरतेने जाणवले." पुन्हा उद्या भेटायला या  प्रेमपुर्वक आग्रहाचा स्वीकार करून मी पुढील प्रवासासाठी मार्गस्थ झालो.त्या रात्रीचे भोजन जाधव साहेब,मनोहर सुर्वे साहेब यांच्यासोबत झाले.सुभाष ढगे साहेब कामानिमित्त वेळाने आले.नंतर मी माणिकपुरी साहेबांच्या घरी विश्रांतीसाठी गेलो.


'प्रत्येकाने स्वतः अगदी स्वच्छ राहिले पाहिजे.तेव्हाच गोष्टी योग्य प्रकारे घडत जातील.तुमची दृष्टी शुद्ध करा आणि मग तुम्हाला कळेल की,त्यात तुम्हाला काहीही करायचे नाहीये.' हे पुस्तकातील वाक्य मी वर्तमानात जगलो. 


माणिक पुरी साहेबांसोबत राहणं म्हणजे निसर्गासोबत राहणं याचा प्रत्यक्ष अनुभव मी घेतला त्यांच्या चेहऱ्यावरील हास्य म्हणजे जीवनातील आनंदाचे कारंजे त्यांच्या सोबत रहाणं म्हणजे मी माझ्यासोबत राहण्यासारखं होतं.


२४ जून २०२३ या प्रवासातील पुढील प्रवास,प्रवास पुढे सुरुच आहे,तो पुढील लेखामध्ये..


● विजय कृष्णात गायकवाड


माणुसकी कधीही सुट्टीवर जात नाही..


मी स्वतः एक चांगली व्यक्ती झालो,की जगातील एक वाईट व्यक्ती कमी झालेले समाधान मला मिळेल.या सर्वश्रेष्ठ विचाराचा प्रभाव मला जाणवला.आपण चांगले बनलो की चांगुलपणा आपली पाठ कधीच सोडत नाही.हा विचार अधोरेखित करणारी एक गोष्ट मला ऐकण्यास मिळाली.ती गोष्ट कोल्हापूरचे आमचे मित्र विनायक पाटील यांनी मला सांगितली.दर सोमवारी मला सुट्टी असते.या सुट्टीदिवशी मी माणुसकी व माणसांना भेटायला जातो.दिनांक २६.०६.२०२३ या दिवशी सकाळी डॉ.सरवदे साहेब (C.P.R.शासकीय रुग्णालय,कोल्हापूर )

यांना भेटलो.राजर्षी शाहु राजांना अभिवादन करुन त्यांचे दर्शन घेवून निरोप घेतला.डॉ.सरवदे साहेब फोटो पुजनासाठी गेले.


सुजल पांचाळ त्यांच्याशी पुस्तक वाचना संदर्भात प्रदीर्घ चर्चा झाली.विनायक पाटील यांना भेटण्यासाठी फोन केला त्यांना भेटल्याशिवाय कोल्हापूरला आल्यासारखं वाटत नाही.आज आम्ही तब्बल तीन ते चार तास एकत्र होतो.विषय होता माणूस,माणुसकी आणि चांगुलपणा गाडीवरून फिरत असताना.त्यांनी एक गोष्ट सांगितली.


ही गोष्ट ऐकल्यानंतर मला सर्वप्रथम जाणीव झाली.ती ही कि माणूस सुट्टीवर जातो पण माणुसकी कधीही सुट्टीवर जात नाही.


एक बर्फ तयार करणारी फॅक्टरी होती.त्या ठिकाणी साधारणत:पाचशे कामगार काम करायचेत.या कामगारांमध्ये एक असा कामगार होता.ज्याचा स्वतःचांगला बनण्यावर व चांगुलपणावर विश्वास होता.हा कामगार सकाळी कामावर येताना.व काम करून परत घरी जात असताना न चुकता सुरक्षारक्षकाला नमस्कार करत असायचा.हा त्याचा अनेक महिन्यांचा न चुकणारा क्रम होता.सर्वकाही नेहमीप्रमाणे व्यवस्थित चालू होतं.पण एक दिवस या व्यवस्थितपणाला थांबावं लागलं.घटनाच तशीच घडली होती.


नेहमीप्रमाणे सर्व कामगार कामावरती आले.

नेहमीप्रमाणे या कामगार ने सुरक्षारक्षकाला नमस्कार केला.व आपुलकीने विचारपूस करून चौकशी केली.

नमस्कार करण्यासाठी व विचारपूस करण्यासाठी काही सेकंदाचा वेळ लागत असे.नेहमीप्रमाणे काम संपले सर्वजण आपापल्या घरी जाण्याच्या तयारीला लागले. जाण्यापूर्वी बर्फ बनवण्यासाठी ( - 0 डिग्री अंश सेल्सिअस तापमान ठेवून फॅक्टरी बंद करुन सर्वजन घरी निघून गेले.पण त्या सर्वामध्ये तो नमस्कार करणारा माणूस नव्हता.कामात व्यस्त असल्यामुळे त्याला वेळेचे भान राहिले नाही.व तो एकटाच काम करत राहिला.बर्फ बनण्याची प्रक्रिया सुरू झाली होती.आणि या बदललेल्या वातावरणाची त्याला जाणीव झाली.आपण या ठिकाणी अडकून पडलेलो आहोत,हे समजले कमालीची थंडी वाढली.आता आपल्याला कोणीही सोडवायला येणार नाही,आणि आपण असेच मरून जाणार या विचाराने त्याला रडू आले.काय करावं हे सुचत नव्हतं.मदतीसाठी कोणताही दरवाजा मोकळा नव्हता.


यामध्ये वेळ गेला आणि कोणीतरी दरवाजा उघडला.

निराश झालेल्या त्या कामगाराला हा चमत्कार वाटला.

जीव वाचवणारा देवदूत कोण आला होता.?हा अविस्मरणीय,व अकल्पनीय प्रसंग त्याला पुन्हा रडवून गेला.त्या सुरक्षारक्षकाने विचारले आत कोणी चुकून राहिलं आहे का ? कोणतीही संधी न सोडता पळत तो त्या रक्षकाजवळ गेला.समोर पहातो तर कोण ? देवदूत हा दुसरा कोणीही नसून आपण ज्याला दररोज नमस्कार करतो,ज्याची विचारपूस करतो तोच प्रत्यक्ष आहे.हे पाहून त्याने धावत जाऊन त्याची गळा भेट घेतली व त्याचे मनापासून जीव वाचवल्याबद्दल वारंवार आभार मानले.


ती दोघेजण बाहेर आली.आपण सुखरूप आहोत.हे पाहूनच त्या कामगाराला स्वर्गीय आनंद झाला.त्याने त्या सुरक्षारक्षकाला विचारले की,तुम्ही दररोज कोणी मागे चुकून राहिला आहे का,याची खात्री करता का? यावेळी त्या रक्षकाने दिलेले उत्तर ऐकून त्याचा चांगुलपणावरील विश्वास द्विगुणीत झाला.त्या रक्षकाने दिलेले उत्तर होते.


नाही,मी दररोज खात्री करत नाही.? मग आजच तुम्ही खात्री का केली.?त्यांने पुन्हा दुसरा प्रश्न विचारला.त्यावेळी त्या सुरक्षारक्षकाने दिलेले उत्तर हे सांगत होते,की माणुसकी कधीही सुट्टीवर जात नाही.तो सुरक्षारक्षक उत्तरा दाखल म्हणाला,आपल्या फॅक्टरीमध्ये पाचशे कामगार काम करतात.तर या कामगारांपैकी फक्त आणि फक्त तुम्ही एकमेव असे आहात जे कामावर येताना आणि कामावरून परत घरी जात असताना मला न चुकता नमस्कार करून माझी विचारपूस करता.आज सकाळी तुम्ही मला नमस्कार करून गेला.पण आज संध्याकाळी फॅक्टरी बंद झाल्यानंतर सर्व कामगार घरी निघाले.सर्व कामगार निघून गेले.पण नमस्कार हा निरोपाचा शब्द माझ्या कानी आला नाही.दररोज संध्याकाळी न चुकता केला जाणारा नमस्कार आज चुकला होता. ( जो कधीच चुकत नव्हता.)


तेव्हाच माझ्या मनात शंका निर्माण झाली व खात्री करण्यासाठी मी आलो,आणि पाहतो.तर तुम्ही

मला या ठिकाणी सापडलात.तुम्हाला सुखरूप पाहून मला तुमच्या पेक्षाही जास्त आनंद झाला.हा तुमच्या नमस्काराचा व चांगुलपणाचा परिणाम आहे."मी तुम्हाला वाचवले नाहीच.तुम्हाला खऱ्या अर्थाने वाचवले आहे,ते तुमच्या नमस्काराने आणि तुमच्या चांगुलपणाने."


कदाचित तो नमस्कार व विचारपूस करणारा माणूस आपण असू शकतो.

२५/६/२३

मी माझ्यासोबत केलेला प्रवास..

जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,

जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे.

असं बोरिक पास्तरनाक यांनी म्हटलेलं आहे. 


प्रत्येक व्यक्तींवर कुणाचातरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा या पुस्तकांनीच मला सांगितलं तुझ्यावर प्रभाव हा फक्त तुझाच हवा ! 


वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.'


याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा, प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो.

कोणतं ही पुस्तक आपण घेताना त्याची किंमत देऊन आपण ते खरेदी करतो.त्या पुस्तकाचे मालक बनतो.पण ज्यावेळी आपण ते पुस्तक वाचतो त्यावेळी ते पुस्तक आपलं बनतं.आपण ते पुस्तक समजून घेतो.त्यावेळी आपण पुस्तकाचे बनतो.मला वाटतं आपण पुस्तकाचं बननं हे खूप महत्वाचे आहे. 


पुस्तकांना मला माझी असण्याची जाणीव करुन दिली.त्यांच्यामुळेच मी दररोज रूपांतरित होत आहे.

बदलत आहे.माझ्या दृष्टीकोनामध्ये अमुलाग्र बदल घडवण्यात ही पुस्तके माझ्या जीवना पलीकडे आहेत.स्वतःबद्दल समजून घेण्यासाठी मोठ्या नम्रतेची गरज असते.स्वतःला जाणणे हा एका नवीन जीवनाचा प्रारंभ आहे.स्वतःला समजून घेतले कि विश्व जाणता येते.आपण काय आहोत,हे पाहणे हाच एक मोठा अविस्मरणीय साक्षात्कार असतो.आपण कशाचेही दडपण न घेता मोकळेपणाने जगू शकतो.

त्यासाठी आपण ज्या जगात राहतो, त्यावर आपण विश्वास ठेवायला हवा रोजच्या जीवनाला मोकळे -

पणाने सामोरे जायला हवे.हे मला पुस्तकांनीच प्रेमळपणे सांगितले.


एका श्रीमंत माणसाला साक्षात अनुभवाविषयी विलक्षण आकर्षण असते.एके दिवशी तो एका सुंदर बेटाची आपल्या राहण्यासाठी निवड करतो.तिथे तो अनेक वर्षे राहतो.निसर्गाच्या सहवासात आपण इथे खूप वर्षे राहिलो,

आता आपण आपल्या मुळ ठिकाणी परत जायला हवे असे त्याला वाटायला लागते.खरे तर तो त्या बेटावर तब्बल तीस वर्षे राहिलेला असतो.जेव्हा तो परत आपल्या मूळ स्थानी ( गावी ) येतो.तेव्हा निरनिराळ्या माध्यमातील लोक-पत्रकार त्याची मुलाखत घेण्यासाठी त्याच्या बंगल्यावर येतात. ज्या बेटावर तो श्रीमंत वास्तव्याला असतो,ते बेट खरोखरीच अप्रतिम असते,

सगळे त्याला विचारायला लागतात.ते निसर्गरम्य बेट कसे आहे?तीस वर्षाच्या या बेटावरील अनुभवाविषयी सविस्तर सांगा ना?या बेटावरील जंगली जनावरांचा तुम्हाला काही अनुभव आला का? या बेटावरचे पर्यावरण व ऋतूचक्र कसे होते? बदलत्या हवामानाचा तुम्हाला त्रास झाला नाही का? इतकी वर्षे तुम्ही या बेटावर राहिलात,त्या बेटाच्या वैशिष्ट्यांविषयी,निसर्गसौंदर्यांविषयी विस्ताराने सांगा ना? असे एक ना अनेक प्रश्न लोकांनी त्या श्रीमंत माणसाला विचारले.त्याने ते सगळे प्रश्न ऐकले आणि तो म्हणाला -


 अरे देवा, इतके ते बेट निसर्गरम्य व सुंदर होते,मी हे जर आधी जे ऐकले असते, तर त्या बेटाचा, तिथल्या निसर्गाचा-बदलत्या ऋतुचक्राचा मी अधिक मनापासून अनुभव घेतला असता.!


पत्रकार जेव्हा त्याला सारे प्रश्न विचारतात,तेव्हा त्याला त्या बेटाविषयी कुतूहल वाटायला लागते.मग त्याच्या लक्षात येते की,


आपण त्या बेटावर वर्षे राहिलो खरे,पण प्रत्यक्षात आपले त्या बेटाशी काहीच नाते नव्हते,आपण तसे काहीच पाहिले नाही,ना कुठला विशिष्ट अनुभव घेतला‌.आपण फक्त ऋतुचक्र ढकलत,तिथे जगत राहिलो.


माझा प्रवास हा मला स्वतःला शोधण्याचा प्रवास होता.मी मेनन पिस्टन रिंग ( टोप - संभापूर )या कंपनीमध्ये कामाला आहे.आठ तास काम केल्यानंतर दोन तास वाचन करतो.साधारणतः दोन ते तीन वर्षांपूर्वी शाहू महाराजांचा एक लेख जो आमचे कवी लेखक माधव गव्हाणे साहेब यांनी लिहिला होता.तो आदरणीय सदाशिव वारे बागणी सांगली जिल्हा यांच्याकडून मला मिळाला.लेख अप्रतिम होता मग मी माधव गव्हाणे साहेबांना फोन केला.त्यापासून मी दररोज त्यांना फोन करतो.निसर्गाशी समरस असणारी व्यक्ती सदाशिव वारे यांच्यामुळे मला लाभली.मी त्यांचा आभारी आहे.त्यानंतर माधव गव्हाने साहेबांनी तुफानातील दिवे आदरणीय विठ्ठल भुसारे उपशिक्षणाधिकारी साहेबांचा फोन नंबर दिला.आमच्यात सुसंवाद सुरु झाले.ऑनलाईन कार्यक्रम झाले.आरक्षण का व कशासाठी? हा लेख मा.सुभाष ढगे यांनी लिहिला होता.या लेखांमधून आमचा सुसंवाद सुरू झाला.संवेदनशील मने जोडत गेलो.हे जोडण्याचं काम माधव गव्हाणे साहेबांनी केलं. त्यानंतर रामराव गायकवाड साहेब,रामराव बोबडे साहेब,गोलू पटवारी,

विष्णू मोरे साहेब गटविकास अधिकारी सेलू,मनोहर गायकवाड,आचार्य ग्लोबल अकॅडमीचे विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी, शिक्षणासाठी तळमळणारे मनोहर दादा सुर्वे, डॉ.संजय मोरे जीवशास्त्राचे प्राध्यापक,ज्यांच्या चेहर्‍यामध्ये मला निसर्ग दिसतो.असे आमचे मित्र माणिक पुरी,शरद ठाकर,छगन शेरे दादा, तुकाराम मगर,आम्ही मोबाईल माध्यमातून बोलत होतो.या सर्व व्यक्ती मोठ्या मनाच्या सर्वांना सामावून घेणाऱ्या लहान लोकांना महान करणार्‍या आहेत.मग मी ठरवलं या महान लोकांना भेटून आपण महान व्हायचं मी परभणीला व सेलू या गावी जाणार आहे.


मी न पाहिलेल्या मित्रांना भेटण्यासाठी माझ्याकडे होता विश्वास ‌.. विश्वास / समजूत म्हणजे एखाद्या गोष्टीबद्दल असलेली खात्री वा हमी ..!


माझ्या मनातील जो विश्वास माझ्यातील क्षमतेचा सर्वोत्तम विनीयोग करून मला सर्वार्थाने व समग्रपणे कार्यान्वित करतो,तो माझ्यासाठी नेहमीच सत्य बनतो.- आंद्रे गाईड


१५ तारखेनंतर या निरोप मिळाला.माझी तयारी सुरू झाली.मनातूनच मी प्रवासाला सुरुवात केली.माझ्या आत्तापर्यंतच्या आयुष्यातील मी माझ्यासाठी केलेला हा पहिलाच प्रवास त्यामुळे मला सर्वांना भेटण्याची ओढ होती.MH 26 BE 3230 या शर्मा ट्रॅव्हलसाठी मेनन पिसँटन रिंग कंपनीतूनच अमर पाटील व सुजय पाटील साहेब यांनी बुकिंग करून माझ्या प्रवासावर शिक्कामोर्तब केले.रात्री नऊ वाजता माझ्या प्रवासाला सुरुवात झाली.

आदरणीय विठ्ठल भुसारे साहेब,सुभाष ढगे साहेब,मनोहर सुर्वे साहेब,माणिक पुरी साहेब त्यांचे फोन येतच होते.

माझ्यासाठी परभणी हे दुसरं घर आहे.याची मला सर्वप्रथम जाणीव झाली.रात्री दहा वाजता मी फोन बंद करून झोपी गेलो.१६ तारखेला बरोबर पहाटे ४.४५ मिनिटांनी विठ्ठल भुसारे साहेबांचा फोन आला.मी औरंगाबादला तातडीच्या कामासाठी जात आहे.तुम्हाला घेऊन येण्याकरिता माणिक पुरी येतील.परभणी माझ्यासाठी आनंदाचे ठिकाण झाले.सकाळी ९ ते ९.३० दरम्यान मी परभणीत दाखल झालो. आपली गाडी परभणीत न जाता अनुसया टॉकीज जवळ थांबेल.अशी सूचना देण्यात आली.


" मी शेजारी प्रवास करणाऱ्या व्यक्तीला याबाबत विचारले. त्यांनी मला प्रतिप्रश्न केला आपण या ठिकाणी नोकरीला आहात का?मी नाही असे उत्तर दिले.मग सुट्टी काढून गावी आलात का?मी त्यांना म्हणालो नाही.फक्त मित्रांना भेटण्याकरीता आलो आहे.कोल्हापूरहून त्यांनी आवंढा गिळला. लगेच पुढचा प्रश्न विचारला आपली आणि त्यांची ओळख कशी मी म्हणालो आम्ही प्रत्यक्ष भेटलेलोच नाही.त्यांनी डोक्यावर हात मारून घेतला." मला घेण्याकरिता माणिक पुरी साहेब आले होते.

कोल्हापूर मधून बसल्यापासून परभणीमध्ये दाखल होईपर्यंत नऊ ते दहा वेळा फोन करणारे विठ्ठल भुसारे साहेब व सुभाष ढगे साहेब यापैकी विठ्ठल भुसारे साहेबांची भेट संध्याकाळी होणार होती.पण सुभाष ढगे साहेब मात्र माझी वाट पाहत थांबले होते.आमच्या भेटीचा संगम झाला.साहेब महाविद्यालयाकडे गेले.


ही सर्व प्रवासाला निघण्याची चाललेली गडबड पाहून आमच्या वडिलांनी काळजीपोटी मला विचारले परभणीला आपलं कोणीही ओळखीचं नाही.आणि तु पहिल्यांदाच निघालेला आहे तिथे तू कसा राहणार? कसा पोहचणार तुला घेण्यासाठी कोणी नाही आलं तर तू काय करणार? मी हसून सांगितलं आण्णा आपण स्वतःला जेवढं ओळखतो तेवढेचं लोकं आपल्याला ओळखत असतात.मी घरी नसताना त्यांनी माझ्या पत्नीला (सौ.मेघाला) विचारले तो परभणीला निघाला आहे.तुला काय त्याची काळजी वाटते का नाही.? त्यावेळी ती त्याच विश्वासाने म्हणाली ते जाण्या अगोदरच त्यांना घेऊन जाण्यासाठी त्यांचे मित्र आलेले असतात.त्यामुळे मला त्यांची काळजी करायचं काहीच कारण नाही.

कारण मित्र आणि मैत्री ही अनोळखी कधीच नसते.


विजय कृष्णात गायकवाड

२३/६/२३

द रिपब्लिक - प्लेटो (इसपू तिसरं ते चौथे शतक)

'रिपब्लिक' या ग्रंथाच्या पहिल्या भागात प्लेटोनं न्याय आणि आदर्श समाज याबद्दल,तर दुसऱ्या भागात तत्त्वज्ञ कसा असावा याविषयी आणि तिसऱ्या भागात समाजावर शासन करणारा शासक कसा असावा याविषयी लिहिलंय. माणसाचं विश्वबंधुत्व,सुप्रजननशास्त्र(यूजेनिक्स), समाजवाद,साम्यवाद (कम्युनिझम),स्त्री-वाद(फेमिनिझम),

संतती नियमन (बर्थ कंट्रोल), मुक्तप्रेम (फ्री - लव्ह),मुक्त अभिव्यक्ती स्वातंत्र्य, नैतिकतेचे मापदंड,मालमत्तेवर

सार्वजनिक मालकी,स्त्रिया आणि मुलं हे सगळं प्लेटोनं 'रिपब्लिक' मध्ये मांडलं आहे.


ख्रिस्तपूर्व ३८० मध्ये प्लेटो या ग्रीक तत्त्वज्ञानं 'रिपब्लिक' नावाचा एक ग्रंथ लिहिला.या ग्रंथामध्ये खरं तर प्लेटोचा मित्र आणि त्याचा गुरू असलेला सॉक्रेटिस यानं त्याच्याबरोबर केलेला संवाद होता.


सॉक्रेटिस प्रत्येक गोष्टीबद्दल शंका व्यक्त करायचा आणि प्रश्न उपस्थित करायचा.तरुणांमध्ये यामुळे तो खूपच लोकप्रिय होता.त्या वेळच्या प्रस्थापितांना हे मुळीच आवडणारं नव्हतं.म्हणून सॉक्रेटिस तरुण मुलांना बिघडवतोय,असे त्या वेळच्या उच्चभ्रू लोकांनी सॉक्रेटिसवर आरोप दाखल केले.त्याला अंधारकोठडीत टाकलं आणि इतकंच नाही तर त्याला हेमलॉक नावाचं विषही प्यायला दिलं. 


सॉक्रेटिस आणि थ्रेसिमॅक्स नावाच्या त्याच्या विरोधकात जी चर्चा झाली,ती न्याय या विषयाला धरून झाली आणि त्यांच्यातलं संभाषणच प्लेटोनं 'रिपब्लिक' या ग्रंथात मांडलं.


'रिपब्लिक' हा ग्रंथ म्हणजे सॉक्रेटिस आणि प्लेटो या दोन महादिग्गजांना एकाच वेळी भेटण.! प्लेटोच्या आयुष्यातलं आणि जगावर प्रभाव पाडणारं हे एक उत्कृष्ट कार्य समजलं जातं.या ग्रंथाच्या पहिल्या भागात त्यानं न्याय आणि आदर्श समाजाबद्दल भाष्य केलं,तर दुसऱ्या भागात तत्त्वज्ञ कसा असावा याविषयी आणि तिसऱ्या भागात समाजावर शासन करणारा शासक कसा असावा याविषयी त्यानं लिहिलंय.


'न्याय' ही संकल्पना काय आहे याविषयी विचार करता करता प्लेटोनं आपल्या आयुष्यात ज्या अनेक गोष्टी,

कल्पना किंवा तत्त्वं आहेत त्या सगळ्यांना स्पर्श केला.

यामध्ये माणसाचं विश्वबंधुत्व,सुप्रजननशास्त्र (युजेनिक्स), समाजवाद,साम्यवाद (कम्युनिझम),स्त्री-वाद(फेमिनिझम),

संतती नियमन (बर्थ कंट्रोल), मुक्तप्रेम ( फ्री - लव्ह),मुक्त अभिव्यक्ति-स्वातंत्र्य,नैतिकतेचे एक किंवा दोन मापदंड,

मालमत्तेवर सार्वजनिक मालकी,स्त्रिया आणि मुलं अशा अनेक गोष्टींविषयीच्या तत्त्वांविषयी प्लेटोनं विचार केला आणि ते सगळं त्यानं 'रिपब्लिक' मध्ये मांडलं.जे योग्य आहे तसंच माणसानं वागावं असं त्याला वाटत असे.

अशा तऱ्हेचं न्याय्य जग निर्माण करण्याच्या मागे तो लागला होता आणि त्यातून 'रिपब्लिक' या ग्रंथाचा जन्म झाला.


प्लेटोचं 'रिपब्लिक' म्हणजे एक आदर्श राज्य किंवा युटोपियाच होता.जन्मापासून ते मृत्यूपर्यंतच्या आयुष्याचं ते एका तऱ्हेनं चित्रणच होतं.त्याच्या 'रिपब्लिक'मध्ये मुलाची वाढ कशी होईल,कोणी कोणी काय काय काम करावीत याचं सखोल वर्णन प्लेटोनं केलेलं आहे. त्याच्याप्रमाणे रिपब्लिकमध्ये जन्मलेली सगळी मुलं ही सगळ्या टोळीची एकत्रितपणे म्हणजेच सगळ्यांची असतील.कुठल्याही एका माणसाचं ते मूल नसेल.त्यातली सगळ्यात चांगले पुरुष निवडून,त्यातल्या सगळ्यात चांगल्या स्त्रिया निवडून त्यांचं मीलन झाल्यानंतर जी मुलं होतील ती मुलं सगळ्या टोळीनं वाढवायची,अशी त्याच्यामध्ये एक कल्पना होती.यालाच सुप्रजननशास्त्र किंवा युजेनिक्स म्हणतात. कुणीही स्वतःस्वतंत्र व्यक्तिगत लग्न करणं किंवा व्यक्तिगत कुटुंब थाटणं अशी कल्पनाच 'रिपब्लिक'मध्ये नव्हती.मुलं झाली रे झाली की ती ताबडतोब सरकारनं चालवलेल्या पाळणाघरात हलवली जातील,असंही त्यात लिहिलं होतं.त्यामुळे कुठल्याही आई-वडिलांनी आपल्या मुलांवर हक्क दाखवता कामा नये, असंही त्याचं मत होतं.तसं केल्यामुळे सर्वांमध्ये बंधुभाव निर्माण होईल आणि कुणीही एकमेकांवर आपल्या मुलांविषयीचा हक्क लादणार नाही,कारण सगळी मुलं सगळ्यांची असतील अशी त्याची ही थिअरी होती. थोडक्यात,ते एक कम्यून होतं,असं प्लेटोचं म्हणणं होतं.


आई-वडिलांच्या बाबतीत बोलायचं झालं तर 'रिपब्लिक' नुसार कुठलाही पुरुष कुठल्याही स्त्रीबरोबर लैंगिक संबंध ठेवू शकत होता. थोडक्यात,आज ज्याला आपण नीतिमत्ता म्हणतो तशा प्रकारची नीतिमत्ता प्लेटोला अभिप्रेत नव्हती.त्यामुळे ज्या वेळी ज्या पुरुषाला ज्या स्त्रीबरोबर जायचं असेल आणि तिची संमती असेल तेव्हा त्यांनी फ्री लव्ह म्हणजे मुक्तपणे प्रेम करावं,असं प्लेटोचं म्हणणं होतं.


कोणाच्याही खासगी आयुष्यात सरकारनं अजिबात डोकावता कामा नये,असं त्यानं लिहिलं होतं.मुलांच्या वाढीबाबत तर प्लेटोच्या कल्पना फारच गंमतीशीर होत्या.

मुलांनी जन्मापासून ते वयाच्या २०व्या वर्षापर्यंत फक्त व्यायाम आणि संगीत यांच्यावरच भर द्यावा आणि याच गोष्टी शिकाव्यात.त्यामुळे समतोल राहतो,असं त्याचं म्हणणं होतं.संगीतामुळे मनाचा समतोल राहतो आणि व्यायामामुळे शरीराचा; आणि त्यामुळे जगामध्ये अराजक किंवा गोंधळ माजणार नाही,असं प्लेटो म्हणत असे.

ज्याला संगीत आवडत नाही त्या माणसावर आपण विश्वाससुद्धा ठेवू नये,असं त्याचं म्हणणं होतं. संगीतामधली हार्मनी आणि समतोलपणा आपल्या जगाला एकसंध ठेवायला मदत करतं आणि म्हणून संगीत महत्त्वाचं आहे,असं त्याचं म्हणणं होतं.यात गंमत अशी की,शिकत असताना,व्यायाम करत असताना मुलं आणि मुली यांनी पूर्ण नग्नावस्थेत व्यायाम केला पाहिजे,असं त्याचं म्हणणं होतं.याचं कारण मानवी शरीर हे उदात्त आणि सुंदर आहे;त्यात लाज बाळगण्यासारखी कुठली गोष्ट आहे? आपण आपल्या गुणांची वस्त्र परिधान केलेली असतात.त्यामुळे या बाह्य वस्त्रांची गरजच काय, असंही प्लेटो म्हणत असे.शिकण्यात आणि शिकवण्यातही खूप मजा यायला पाहिजे,ते कंटाळवाणं होऊ नये म्हणून प्लेटो अतिशय दक्ष होता.


वयाच्या २०व्या वर्षानंतर या मुलांनी काय करायचं? त्यांच्यामधले जे सशक्त तरुण असतील,जे पुढे जाऊ शकतील आणि जे पुढे शिक्षण घेऊ शकतील अशी मंडळी वेगळी करायची आणि जी पुढे शिक्षण घेऊ शकणार नाहीत,ज्यांची क्षमता नाही अशी मुलं वेगळी करायची,

असं प्लेटो म्हणायचा.जे खालच्या क्षमतेचे असतील ते शेतकरी,कामगार किंवा मजूर होतील किंवा उद्योजकसुद्धा होतील,असं प्लेटोचं म्हणणं होतं.थोडक्यात,

उद्योजकांनासुद्धा तो खालचाच समजायचा.तसंच जे याच्यापुढे शिक्षण घेऊ शकतील अशा लोकांनी वयाच्या २० ते ३० वर्षांपर्यंत विज्ञान,गणित,अंकगणित, भूमिती आणि खगोलशास्त्र या शाखांमध्ये शिक्षण घ्यावं,असं त्याचं म्हणणं होतं;पण अंकगणित किंवा भूमिती शिकताना त्याचा उपयोग करावा असं मात्र त्याला फारसं वाटत नसे.गंमत म्हणजे पूल बांधताना,शेती करताना किंवा कुठलीही यंत्र बनवताना या गणिताचा उपयोग करणं म्हणजे तो खालच्या दर्जाचं समजत असे.हा गणिताचा उपयोग नाही.याचं कारण त्या वेळी ग्रीसमध्ये विकासामध्ये आपल्या आजूबाजूची भौतिक परिस्थिती सुधारण्यापेक्षा आपल्या आत्म्याची आणि मनाची शांती यात आपली प्रगती व्हावी अशी त्यांची समजूतच होती आणि प्लेटोचीही तशीच समजूत होती.


'रिपब्लिक' प्रमाणे ३० वय झाल्यावर म्हणजे शिक्षण पूर्ण झाल्यावर या मुलांना आणखी एक परीक्षा द्यावी लागत होती.या परीक्षेत जे पास होणार नाहीत,ते मात्र या शिक्षणातून बाहेर पडतील.अशांना प्लेटो 'मध्यमवर्गीय' म्हणायचा आणि अशांनी सैन्यात भरती होऊन देशाचं रक्षण करावं,असं तो म्हणायचा,प्लेटोला युद्ध आवडत नसे.त्यामुळे या सैन्यांनी आक्रमण कधी करू नये,फक्त संरक्षण करावं,असं त्याचं म्हणणं होतं. यातून जे उरलेले असतील,त्यांनी मात्र तत्त्वज्ञान शिकावं,असं त्याचं मत होतं,तत्त्वज्ञानाचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी राज्यकर्ते म्हणून काम करावं,असं प्लेटो म्हणायचा.


या सगळ्या प्रशिक्षणामध्ये पुरुष आणि स्त्रिया यांच्यामध्ये पूर्ण समानता प्लेटोला अभिप्रेत होती.शिक्षणानंतर पाच वर्षांचं प्रशिक्षण पूर्ण झालं की,ही मंडळी आता प्रत्यक्ष कृतीसाठी तयार झाली आहेत,असं त्याचं म्हणणं होतं. वयाच्या ३५ शी नंतर त्यांनी राज्य कसं चालवावं याचा पोस्ट ग्रॅज्युएट कोर्स केला पाहिजे,अशी प्लेटोची एक धारणा होती.प्रत्यक्ष राज्य चालवण्याअगोदर त्यांना एकंदरीत समाजाचं, तिथल्या परिस्थितीचं,तिथल्या कायद्याचं आणि तिथल्या प्रश्नांचं गांभीर्य कळायला पाहिजे आणि मगच त्यांनी राज्यकर्ते व्हायला पाहिजे. थोडक्यात,त्यांनी अँप्रेंटिसशिप केली पाहिजे, असं त्याचं म्हणणं होतं आणि ही अँप्रेंटिसशिप प्लेटोच्या मते १५ वर्ष चालणार होती.५० वय ओलांडलं आणि या सगळ्या पायऱ्या त्यानं ओलांडल्या,की तो तत्त्वज्ञ हा राजा (फिलॉसॉफर किंग) झाला,असं प्लेटोचं म्हणणं होतं.असे तत्त्वज्ञ आणि अशी तयार झालेली माणसं जर शासक किंवा राज्यकर्ती झाली तर एक चांगलं आदर्श राज्य निर्माण होईल,असं प्लेटोला वाटायचं.म्हणूनच तत्त्वज्ञांनी राज्य करावं किंवा राज्यकर्त्यांनी तरी तत्त्वज्ञ व्हावं,असं प्लेटो नेहमी म्हणायचा.हे तत्त्वज्ञ शासक उच्च वर्गातले असले पाहिजेत आणि त्यांनीच राज्य करावं असं प्लेटो म्हणे.या वर्गाखाली आणखी दोन वर्ग होते.एक म्हणजे सैनिकांचा आणि दुसरा म्हणजे शेतकरी, कष्टकरी आणि उद्योजकांचा.या दोन्ही वर्गांनी तत्त्वज्ञ राज्यकत्यांचं म्हणणं ऐकलं पाहिजे आणि त्यांच्या आज्ञा पाळल्या पाहिजेत

,असं प्लेटो म्हणायचा.तसंच आश्चर्य म्हणजे राजाकडे खासगी मालमत्ता असता कामा नयेत,असं प्लेटोनं सांगितलं.तत्त्वज्ञ राज्यकर्त्यांनी जनतेबरोबर राहावं,

जनतेबरोबर उठावं,बसावं, जेवावं,झोपावं; त्यामुळे भ्रष्टाचार होणार नाही, असं त्याला नेहमी वाटायचं राज्यकत्यांसाठी वेगळी व्यवस्था करायला हवी,असं त्याला वाटत नसे.वैयक्तिक स्वार्थ आणि स्वतःची वैयक्तिक संपत्ती नसेल तर ते नेहमी न्यायाच्या बाजूनेच काम करतील,असं प्लेटोला वाटत असे.


'रिपब्लिक' ग्रंथ जगासमोर आणणारा प्लेटो होता तरी कोण ?


प्लेटोचा जन्म हा ख्रिस्तपूर्व ४२४ मध्ये ग्रीस देशातल्या एजना या अँथेन्स नगरामध्ये झाला. त्याचं खरं नाव ॲरिस्टोकल्स असं होतं;पण ग्रीक भाषेत प्लेटॉन म्हणजे रुंद आणि प्लेटोचे खांदे रुंद असल्यामुळे प्लेटो हे नाव त्याला बहाल झालं होतं. त्याचं लहानपण सुखात गेलं.प्लेटो कुस्ती खेळण्यात पटाईत होता.

लहानपणापासून प्रकृतीनं तो दणकट असल्यामुळे त्यानं सैनिक म्हणूनही काम केलं. तसंच तो दिसायलाही देखणा असल्यामुळे त्याच्यामागे अनेक तरुण- तरुणींचे घोळके असत.तो तरुणपणी कविताही करत असे. आपण खूप मोठा कवी होण्याची स्वप्नं तो बघत असे.


वयाच्या २० व्या वर्षी एकदा एका स्पर्धेसाठी आपलं संगीत नाटक द्यायला जात असतानाच त्यानं वाटेत चाललेलं सॉक्रेटिसचं भाषण ऐकलं.सॉक्रेटिसच्या बोलण्याकडे तो इतका आकर्षिला गेला,की त्यानं आपल्या कविता चक्क जाळून टाकल्या.प्लेटोन सॉक्रेटिसचं शिष्यत्व पत्करलं. 


सॉक्रेटिसच्या काळात आपण जन्माला आलो, ही फार मोठी भाग्याची गोष्ट आहे,असं प्लेटो म्हणायचा.सद्गुण म्हणजेच ज्ञान,असं सॉक्रेटिस म्हणायचा.प्लेटोचंही तेच मत झालं होतं. प्लेटोच्या काळात गुलाम,स्त्रिया आणि मुलं यांना राजकारणात भाग घ्यायला परवानगी नव्हती.


प्लेटो ३० वर्षांचा असताना सॉक्रेटिसवर मुलांची मनं भडकवण्याचा आरोप होऊन त्याला मृत्युदंड देण्यात आला.प्लेटोच्या समोर हे सगळं घडल्यामुळे प्लेटोला अतोनात दुःख झालं.पळून जाण्याची शक्यता असूनदेखील सॉक्रेटिसनं मृत्युदंड स्वीकारला याचा प्लेटोवर खूप मोठा परिणाम झाला.त्यामुळे राज्यव्यवस्थेतच बदल केला पाहिजे,राज्यव्यवस्थेतच चूक असली पाहिजे नाही,तर सॉक्रेटिसचे प्राण गेले नसते, असं प्लेटोला वाटायला लागलं आणि आदर्श राज्यव्यवस्था कुठली याचा शोध घेण्याचं प्लेटोनं ठरवलं.तुरुंगात असताना सॉक्रेटिसनं जे काही संभाषण केलं त्याला 'डायलॉग्ज' म्हणतात; ते डायलॉग्ज प्लेटोनं नंतर लिहून काढले.हे जे डायलॉग्ज आहेत ते प्रत्यक्ष सॉक्रेटिसचे आहेत का प्लेटोनं त्यात स्वतःचेही विचार मांडले आहेत याच्याविषयी बरीच मतमतांतरं आहेत;पण त्यामधून सॉक्रेटिसचे आणि प्लेटोचे विचार आपल्याला वाचायला मिळतात.


ख्रिस्तपूर्व ३९९ मध्ये प्लेटोन अँथेन्स सोडलं आणि ख्रिस्तपूर्व ३८६ पर्यंत म्हणजे जवळजवळ १३ वर्षं तो चक्क अज्ञातवासात गेला.त्या वेळी त्याच्या मनात अनेक वादळ उठली होती. त्यानं ३० शासकांच्या राजवटी बघितल्या आणि त्यांचं अपयशही बघितलं.त्यानंतर येणाऱ्या लोकशाही राजवटीत तरी चांगली समाजराज्य व्यवस्था निर्माण होईल असं त्याला वाटलं होतं; पण याच राजवटीत त्यानं आपला परममित्र आणि गुरू सॉक्रेटिस याचा मृत्युदंडही बघितला होता.त्यामुळे त्याचा कुठल्याही राज्यव्यवस्थेवरचा आणि सरकारवरचा विश्वासच उडाला होता.जर तत्त्वज्ञच राज्य चालवायला लागले किंवा राज्यकर्तेच तत्त्वज्ञ बनले तरच जी राज्यव्यवस्था निर्माण होईल ती आदर्श असेल, असं त्याचं ठाम मत बनलं.हे सगळं आपल्याला "रिपब्लिक'मधल्या सातव्या पत्रामध्ये (सेव्हन्थ लेटर) वाचायला मिळतं..


प्लेटोच्या तत्त्वज्ञानाकडे जर बघायचं असेल तर त्या वेळची परिस्थिती काय होती हे बघावं लागेल.प्लेटो अँथेन्समध्ये वाढला.अँथेन्स म्हणजे ग्रीसमधला डोंगर-टेकड्यांचा एक प्रदेश होता.त्या वेळी ग्रीस छोट्या छोट्या सिटी स्टेट्समध्ये म्हणजे नगर राज्यांमध्ये विभागलं गेलं होतं.अँथेन्समध्ये ४-५ हजार लोक राहात असत.तिथे लोकशाही पद्धतीनं राज्यकारभार चालत असे.सर्व पुरुषांना त्या वेळी राज्यकारभारात सहभागी होता येत असे. अँथेन्सशेजारी जी नगर राज्यं होती,तिथे मात्र वेगवेगळ्या तऱ्हेची राज्यव्यवस्था होती. ग्रीसमध्ये त्या वेळी अँथेन्स आणि स्पार्टा अशी दोन नगर राज्य म्हणजे "सिटी स्टेट्स' होती. त्यामध्ये खूप मिन्नता होती. म्हणजे अथेन्स हे सामाजिक,आर्थिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या पुढारलेलं लोकशाही राज्य होतं,तर स्पार्टा मात्र क्रीडा म्हणजे खेळ आणि युद्ध या क्षेत्रांत प्रगत असलेल मूठभर श्रीमंतांचं शासन असलेलं राज्य होतं.या दोन नगर राज्यांमध्ये जे युद्ध झालं ते बेलोपोनेशियन युद्ध म्हणून ओळखलं जातं. या युद्धामध्ये अँथेन्सचा पराभव झाला.या पराभवाची कारणं शोधताना प्लेटोन आपले राजकीय विचार मांडायला सुरुवात केली. ते विचारसुद्धा सॉक्रेटिसच्या "डायलॉग्जवरच आधारलेले होते.प्लेटोला तीन महत्त्वाचे प्रश्न खुणावत होते.'न्याय म्हणजे काय?' तसंच 'राज्य कोणी करावं' आणि 'कसं राज्य करावं?' असे मूलभूत प्रश्न प्लेटोन स्वतःला विचारले आणि त्यातूनच खऱ्या अर्थानं 'रिपब्लिक ग्रंथाचा जन्म झाला.


"रिपब्लिक' या ग्रंथात प्लेटोनं त्याच्या आदर्श राज्याच्या कल्पना मांडल्या होत्या.चित्रकार आणि संगीतकार यांना समाजबाह्य ठरवावं,असं तो म्हणत

असे.गुन्हेगारांना गुन्हे करण्यापासून थोपवावं,त्यांचं मन वळवावं,पण त्यांना शिक्षा करू नये,असं प्लेटो म्हणत असे,कारण त्यांच्यातली गुन्हेगारी प्रवृत्ती त्यांच्या अज्ञानातून निर्माण झालेली आहे आणि आपण त्यांना ज्ञान दिलं की,त्यांची ही प्रवृत्ती कमी होईल,असे प्लेटोला वाटत असे. 


प्लेटोच्या 'रिपब्लिक मध्ये वकिलांना तो दुष्ट म्हणायचा.

जिथे ज्ञान आहे तिथे खरं तर खटले आणि कायदा यांची गरजच राहणार नाही,असं तो म्हणायचा.'रिपब्लिक' मध्ये जे काही कायदे असतील ते थोडेच असतील.ते सोपे आणि लोकांना समजतील असे असतील.याचं कारण कोणताही नवीन कायदा निर्माण केला की,तो तोडण्याची इच्छा निर्माण होईल आणि ते तोडणारे बरेच निर्माण होतील,असंही प्लेटोला वाटत असे.तसंच राज्यकर्त्याचे मुख्य काम हे प्रजेला आनंदी ठेवणं आणि त्यांचं आरोग्य सांभाळण हेच आहे.असं तो म्हणायचा.


आपली कारणमीमांसा आपल्या मेंदूत आपलं स्पिरिट आपल्या हृदयात,तर आपली भूक आपल्या पोटात दडलेली असते आणि या सगळ्या गोष्टी आपल्या पाठीतल्या कण्यातल्या 'मॅरोज'नं एकमेकांशी जोडलेल्या असतात,असं प्लेटोला वाटायचं.गमतीची गोष्ट म्हणजे आपल्या भावना आपल्या रक्तवाहिन्यांमधून वाहतात, असंही तो म्हणायचा.आपल्या स्मृती या मेणाच्या ब्लॉकसारख्या असतात,त्यावर आपण काही कोरलं तर जसं ते टिकून राहतं तशीच आपली स्मृती असते आणि काही मेण जसं वितळत तसंच काहींच्या फारसं लक्षात राहत नाही, असंही तो म्हणायचा.आपण आपला अनुभव आपल्या मनाच्या कोऱ्या पाटीवर लिहीत असतो आणि त्यातूनच आपलं ज्ञान वाढतं, असं प्लेटोचं म्हणणं होतं.


प्लेटोचा आत्म्यावर विश्वास होता.आज आपण ज्याला मन म्हणतो,त्याला प्लेटो आत्मा म्हणायचा.आपल्या शरीरापेक्षा आपला आत्मा ही एक वेगळी गोष्ट असते,

त्यामुळे आपलं शरीर नष्ट झालं तरी आत्मा जिवंतच असतो,असं त्याला वाटायचं,आपल्याकडेही आत्मा अमर आहे,अस आपण म्हणतो तसाच हा प्रकार होता. आपली बुद्धी मात्र आपल्या डोक्यात असते, असं प्लेटोला वाटायचं.प्लेटोनं त्याच्या मानसशास्त्रामध्येही भूमिती आणली होती. त्याच्या मते गोलाकार हा परिपूर्ण असा आकार असतो.माणसाचं डोकं हे सर्वसाधारणपणे गोलाकार असल्यामुळे त्यातला मेंदू हाच आपलं मन नियंत्रित करत असला पाहिजे,असं त्याचं मत होतं.खरं तर त्याचं मत बरोबर असलं तरी ते मत विचित्र अशा युक्तिवादानं तयार झालेलं होतं.


पृथ्वी,जल,वायू आणि अग्नी यातूनच माणसाच्या प्रकृती तयार झाल्या.माणसाच्या सारं काही निमूटपणे स्वीकारण्याच्या वृत्तीचा संबंध पाण्याशी,संतापीपणाचा संबंध अग्रीशी, उदासीनतेचा संबंध पृथ्वीशी आणि उत्साही वृत्तीचा संबंध हवेशी असून जेव्हा या चारही वृत्ती एकत्र होतात तेव्हा माणूस चैतन्यमय दिसतो आणि या चारही वृत्तींचा समतोल साधलेला मनुष्य समाधानी असतो.कुठल्याही वृत्तीचा अतिरेक झाला,तरी त्या माणसांत दोष निर्माण होतो,असं प्लेटोचं तत्त्वज्ञान होतं आणि त्या काळचा इटलीतला जगविख्यात असलेला चित्रकार लिओनार्दो दा व्हिंची याच्यावर प्लेटोच्या तत्त्वज्ञानाचा खूप मोठा प्रभाव होता.


प्लेटोच्या डिक्शनरीमध्ये त्याच्या तत्त्वज्ञानाप्रमाणे ब्युटी म्हणजे सौंदर्य,जस्टिस म्हणजे न्याय,लव्ह म्हणजे प्रेम या जवळपास सारख्याच आणि महत्त्वाच्या कल्पना होत्या.

फक्त थिअरी मांडून प्लेटोचं समाधान होत नव्हतं.त्याला हे आदर्श चित्र प्रत्यक्षात उतरवायचं होतं.त्यामुळे चिनी तत्त्वज्ञ कन्फ्युशिअस प्रमाणेच त्यानं आपल्या कल्पना प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे डायोनिसिअस यानं जेव्हा प्लेटोला राज्यविषयक

सल्ला द्यावा म्हणून आमंत्रण दिलं तेव्हा तो सायराक्यूसला गेला आणि तिथल्या सम्राटाला राज्य कसं करायचं याविषयी धडे द्यायला सुरुवात केली;पण डायोनिसि हा फक्त राजा होता.तो काही तत्त्वज्ञ नव्हता आणि त्यामुळे प्लेटोच्या क्रांतिकारी कल्पना त्याला आवडल्या नाहीत आणि त्यानं प्लेटोला चक्क मृत्युदंड देण्याची धमकी दिली.या वेळी प्लेटोच्या काही मित्रांनी मध्यस्थी केली आणि त्यामुळे प्लेटोची सुटका झाली.


वयाच्या ८१ व्या वर्षी एका मित्राच्या लग्नसमारंभाला गेला असताना तिथले आवाज सहन न झाल्यानं तो विश्रांती घेण्यासाठी शेजारच्या खोलीत गेला आणि विश्रांती घेत असतानाच प्लेटोचा मृत्यू झाला.आज प्लेटो आणि सॉक्रेटिस नसले,तरी ते 'रिपब्लिक' या ग्रंथाच्या रूपात आपल्या मनात कायम असतील आणि आहेत यात काही शंकाच नाही !


 संगीतामुळे मनाचा समतोल राहतो आणि व्यायामामुळे शरीराचा.- प्लेटो


१७ जून २०२३ या लेखमालेतील पुढील लेख.