* विजय गायकवाड | Vijay Gaikawad: मी माझ्यासोबत केलेला प्रवास.. भाग ४

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

१/७/२३

मी माझ्यासोबत केलेला प्रवास.. भाग ४

एक सत्य घटना आहे.कोलंबसन अमेरिकेचा शोध घेण्यासाठी मोठ्या सफरीला निघाला.जहाजावर त्यांनी

तीन महिन्याचे धान्य-पाणी घेतले. इतकेच नव्हे तर काही कबुतरेही त्यांनी आपल्यासोबत घेतली.या प्रवासात त्याला कुठेही जमीन किंवा एखाद्या बेटाचा तुकडाही दृष्टीपथास पडला नाही.सगळीकडे फक्त पाणीच पाणी.एके क्षणी प्रवासात सोबत घेतलेले सगळे अन्न-धन्य संपायला आले.शेवटी तर केवळ तीन दिवसांचा शिधा तेवढा उरला.


रोज सकाळी कोलंबस कबुतरांना आकाशात उडवायचा पण कुठेही जमीन नसल्यामुळे कबुतरे पुन्हा बोटीवर परतायची.जेव्हा कबुतरे परतायची, तेव्हा कोलंबस खूप उदास व्हायचा. सभोवताली फक्त अथांग समुद्र-पाणीच पाणी. तो दिवस असाच गेला.दुसऱ्या दिवशी कुठेतरी किनारा मिळेल म्हणून त्याने आपली कबुतरे आकाशात सोडली पण याही वेळेला कबुतरे परत जहाजावरच परतली.


तीन महिन्यात एखादा जमिनीचा तुकडा देखील दृष्टिपथात दिसलेला नव्हता.आता तर सगळेच अन्न-धान्य,पाणी संपून गेले होते.बरं परत फिरावं म्हटलं तर ते शक्य नव्हते.तिसर्‍या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे कोलंबसने आपली कबुतरे आकाशात सोडली.कबुतरे चारही दिशांना पांगली.मुख्य म्हणजे बराच वेळ झाला तरी परतली नाहीत.कोलंबसला आशेचा मोठा किरण दिसला. तीन-चार तास झाले तरी कबुतरे परत यायची काही चिन्हे दिसेनात.तेव्हा कोलंबसच्या डोळ्यात पाणी उभे राहिले. तो सहकाऱ्यांना म्हणाला,'इतक्या दिवसांच्या प्रवासाचे-मेहनतीचे फळ आपल्याला मिळते आहे.ज्याअर्थी कबुतरे परत फिरली नाहीत,त्याअर्थी आसपास इथेच कुठेतरी जमीन आहे.कोलंबसच्या साथीदारांच्या डोळ्यात पाणी आले.अखेरीस त्यांना किनारा दिसला.कोलंबससह सगळे साथीदार आनंदाने नाचू लागले.एकमेकांना मिठ्या मारू लागले.


बघितलं ? तुमच्या मनात जर विश्वास असेल तर काय अशक्य आहे ? तुम्हाला एक ना एक दिवस सफलता मिळणारच फक्त तुम्ही पुढे जात राहिले पाहिजे.

कारण या प्रवासातच या प्रवासाची सांगता असते.



दुसऱ्या दिवशी आदरणीय रामराव गायकवाड साहेब यांच्या घरी मी रामराव बोबडे,शरद ठाकर सर,माधव गव्हाणे सर जेवायला गेलो.( रात्रीचे जेवन आदरणीय विष्णु मोरे साहेब गटविकास अधिकारी यांच्यासोबत झाले.) कौटुंबिक वातावरणात,आनंदात तृप्त जेवण झाले.मी माधव गव्हाणे साहेबांच्या जि.प.प्रा.शाळा,रायपूर या त्यांच्या शाळेकडे जाणार होतो.या शाळेमध्ये शिक्षण घेत असणारे वैष्णवी,तनुष्का,सोहम,आर्यन,आदर्श,मोहन हे विद्यार्थी भन्नाट कविता करतात.निसर्गाचे, सभोवताली असणाऱ्या परिस्थितीचे,लोकांचे सूक्ष्म निरीक्षण करतात. व ते कवितेद्वारे प्रकट होतात.खूपच प्रभावी कविता असतात.


'गुरु चौकस शिष्याच्या प्रश्नांना योग्य दिशा व दृष्टी देतो.असे बुध्द म्हणतात.' 


हे सत्य मी प्रत्यक्ष आज पाहणार होतो. त्या शाळेला विद्यार्थ्यांना,शिक्षकांना,त्या गावातील ज्येष्ठ नागरिकांना,

आदर्श पालकांना भेटण्याची ओढ मला लागली होती.

'तळमळ म्हणजेच शिक्षण' ही तळमळ मला लागली होती.आम्ही दोघेही निघालो.कार्यालयामध्ये जाऊन येथील मुख्याध्यापक काळे सर,सर्व शिक्षक आणि गावातील मान्यवरांसोबत चर्चा केली.संवाद साधला मग मी त्या विद्यार्थ्यांना भेटण्याकरिता त्यांच्या वर्गाकडे निघालो.भेटीची उत्सुकता होतीच.


वर्गामध्ये जाताच माझ्यावरती फुलांचा,फुलांच्या कळ्यांचा वर्षाव करण्यात आला.शाळेतील या विद्यार्थ्यांचे निखळ प्रेम पाहून मी हवालदिल,भावनिक झालो.माझं हरवलेलं

बालपण एवढ्या 'मोठ्या' रुपात मला भेटलं. मी नवीनच शाळेत प्रवेश घेतला व एवढे हुश्शार सवंगडी मला लाभलीत याचा मला फार अभिमान वाटतो.थेट व मोकळ्या मनाच्या या मुलांच्यामुळे मला जीवनाची नव्याने ओळख झाली.


ही मुलं म्हणजे निसर्गातील निरागस रुपातील फुलेचं..


पालक आले त्यांच्याशी मुलांच्या अभ्यासातील प्रगतीबद्दल बोललो.शिक्षक स्वतःची लेकरं म्हणून शिक्षण देतात.या शिक्षकांचे आम्ही मनापासून आभारी आहोत.

अशी कृतज्ञता त्यांनी व्यक्त केली.आमच्या लेकरांना व शिक्षकांना या शाळेला पण भेटण्याकरिता आला याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत.असं बोलण्यासही ते विसरले नाहीत.शाळेच्या पटांगणात विद्यार्थ्यांना शिक्षण,शिक्षक,पुस्तकाचे मूल्य,आई वडिलांचे जीवनातील स्थान,यशस्वी होण्यासाठी कष्टाला पर्याय नाही.अशा सर्व विषयांवर मी त्यांच्याशी सुसंवाद साधला. कार्यक्रम संपल्यानंतर मुलांनी माझी मुलाखत घेतली.

त्यांची प्रश्न भन्नाट होती.सर आपल्या आवडते पुस्तक कुठले?आपला आवडता मित्र कोणता त्याच नाव काय?तुम्ही आतापर्यंत किती पुस्तके वाचली आहात?सर आपण लहानपणी खेळत होता का?खेळत होतात तर कोणकोणते खेळ खेळत होता?सर आपण पुढील शिक्षण का घेतले नाही?हा प्रवास आपला कसा झाला? तुम्ही आम्हाला भेट म्हणून दिलेले पुस्तक 'कुणाला सांगू नका' हे मी नक्की वाचू व जीवनात यशस्वी होऊ असं त्यांनी मला मनापासून सांगितलं.


लक्ष्मण गाडेकर तात्या,काही पालक आणि विद्यार्थ्यांच्या सोबत गावात लोकवर्गणीतून उभा केलेला सभामंडप,

ऐतिहासिक अशी यादव कालीन 'बारव' आम्ही

सर्वांनी पाहिली व त्यांच्यासोबत खूप सार्‍या गप्पा झाल्या.त्यांच्या आयुष्यातील चढउतार,यशाचे शिखर यावर मनोसक्त बोललो.सर्वाचा मनापासून निरोप घेवून आम्ही रायपूर पासून अंदाजे १० ते १२ किलोमीटर अंतरावर असणाऱ्या चारठाणा या ठिकाणी जाण्यासाठी पुढील प्रवास सुरू केला.


या ठिकाणी माधव गव्हाणे सरांचे मार्गदर्शक, मनमिळाऊ स्वभावाचे नारायण गडदे सर आमची आनंदाने वाट पाहत होते.साहित्य,काव्य,पुस्तके,वाचन,शाळा हेच मंदिर,या आवडीच्या विषयावर प्रसन्न मनाने ते बोलले.त्यानंतर भाऊसाहेब कोकरे सर,सकनूर सर आम्हाला येऊन भेटले.आम्ही सर्वजण पुढील प्रवासासाठी निघालो.


चारठाणा किंवा चारठाणे हे महाराष्ट्रातील परभणी जिल्ह्याच्या जिंतूर तालुक्यातील गाव आहे.येथे प्राचीन मंदिरे आहेत.इसवी सनाच्या ११ व्या ते १२ व्या शतकात म्हणजेच देवगिरीच्या यादव राजांच्या काळापासून या गावाचा इतिहास आहे.या काळात येथे हेमाडपंती पद्धतीची मंदिरे बांधली गेली.येथे हैद्राबाद मुक्ती संग्रामातील काही घटना घडल्या होत्या.


येथील अनेक मंदिरांपैकी काही मंदिरे अद्याप शिल्लक आहेत.

१) गोकुळेश्वर महादेव मंदिर

२) जोड महादेव मंदिर

३) खुराची देवी मंदिर

४) उकंडेश्वर महादेव मंदिर

५) दीपमाळ / मानसस्तंभ

६) गणपती मंदिर

७) गोद्रीतील महादेव मंदिर

८) ऋतुविहार (पांढरीतील मंदिर ) ( सध्या अवशेष शिल्लक )

९) नरसिंह तीर्थ मंदिर


ही मंदिरे दगडी बांधकामाची आहेत.गावात गोकुळेश्वर मंदिराजवळ पुष्करणी तीर्थ बारव असून आज देखील तिला पाणी उपलब्ध आहे. या मंदिराच्या दक्षिणेस एक विश्रामधाम असून याच्या भिंतीत भुयारी मार्ग आहे.


चारठाणा हे जवळपास १० हजार लोकसंख्येचे गाव असून औरंगाबाद-नांदेड या मार्गावर मंठा ते जिंतूर या दरम्यान आहे.जिंतूर ते चारठाणा हे अंतर १८ किमी आहे. हे पाहत असताना  


"आपण स्वतःला जसे समजतो तसे बनतो. आपल्या विचारानुसार आपले वर्तन असते, आणि आपल्या आसपासचे जगही त्यानुसारच घडते.- गौतम बुद्ध " 


 पुस्तकातील या वाक्याची प्रखरपणे आठवण झाली.ती सर्व मंदिरे पहात असताना आमचे आदरणीय परम मित्र माधव गव्हाणे साहेबांनी  या वास्तू कल्पकतेच्या अनुषंगाने एक घटना सांगितली.


६ जून १६७४ या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा पार पडला.

या दिवशी सूर्य नगारखान्याच्या कमानीतून उगवला होता.आणि त्याचे पहिले किरण सिंहासनावर पडले होते. मध्यान्हाच्या वेळी सूर्य सरळ सिंहासनाच्या चौथऱ्यावर सूर्य येणार होता.असे भौगोलिक महत्व लक्षात घेऊनच ६ जून १६७४ ही तारीख ठरवण्यात आली असावी असे वाटते.त्या दिवशीचा सूर्याचा मार्ग समजून घेण्यासाठी  solar path app च्या मदतीने आजही शोधून काढता येते.

      -मिलिंद पराडकर (दुर्ग अभ्यासक)


 माझ्यासाठी हे खूपच नाविण्यपूर्ण होतं या माहितीबद्दल व सर्व आदरणीय मित्रांनी वेळ काढून आम्हाला ही ऐतिहासिक कलाकृती,इतिहास,शौर्य,पराक्रम,

कलात्मकता,दाखविल्याबद्दल त्यांचा पाहुणचार घेऊन आभार मानून ही भेट अपूर्ण ठेवून परतीचा प्रवास सुरू केला.संध्याकाळी ६.३० वाजता मगर सरांच्या गच्ची वरती वाचन संस्कृती,वाचनाचे जीवनातील स्थान,वाचणामुळे घडलेला माणूस,वाचनामुळे बदलला जाणार दृष्टीकोण या विषयावर सुसंवादाचा कार्यक्रम ठेवला गेला होता.अनेक तज्ञ,सामाजिक कार्य करणारे,सर्वांचं भलं व्हावं ही तळमळ मनात बाळगणारे शिक्षक,वाचक प्रेमी,संस्थापक अशी सर्वजण एकत्रित आली होती.मी माझा पुस्तकाचा प्रवास माणसापासून माणसांपर्यंतचा प्रवास सांगितला.

कोल्हापूरहून परभणीला फक्त माझ्या लोकांना माझ्या मित्रांना भेटण्याकरता केला आहे.असं सांगितलं या लोकांनी दिलेले प्रेम मान,सन्मान,आदर,आपुलकीने

मी भारावून गेलो.सद्गदित झालो. माझा पुस्तक प्रवास मी थांबवला.मी भरपूर बोलणं अपेक्षित होतं.पण त्या ठिकाणी मला थांबण महत्वाचं होतं.म्हणून मी थांबलो संध्याकाळी आदराचं भोजन रामराव बोबडे सर यांच्या घरी झालं.मनोहर गायकवाड,भारीच भोईते सर,गोलू पटवारी ( गोड बोलतात म्हणून साखर सम्राट ) यांची विशेष भेट आनंद देवून गेली.भोजनानंतर अनेक विषयावर चर्चा झाली.सर्वांच्या भेटी घेऊन शरद ठाकर सरांच्या घरी विश्रांतीसाठी गेलो.


कोल्हापूरला परत येण्याची गडबड सुरु झाली.मला परभणीला सोडण्यासाठी रामराव बोबडे,रामराव गायकवाड,माधव गव्हाणे हे आले होते.परभणीमध्ये आचार्य ग्लोबल अकॅडमीचे मनोहर सुर्वे यांनी माझ्या निरोप समारंभाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या ठिकाणी अनेक मान्यवर हजर झालेली होती. प्रत्येक व्यक्तीने आपलं मनोगत व्यक्त केले.माझं ह्रदय भरुन आले.विठ्ठल भुसारे साहेब यांनी 'तुफानातील दिवे' गीत म्हणून दाखविले. संध्याकाळचे जेवण साहेबांच्या घरी करून शर्मा ट्रॅव्हल पर्यंत पोहच करण्यासाठी साहेबांनी आपली गाडी दिली.सुभाष ढगे,माधव गव्हाणे, रामराव गायकवाड,रामराव बोबडे प्रचंड थंडी असूनही मला निरोप देण्यासाठी आली होती. माझे तर डोळे आणि मन भरुन आले होते. मी फक्त बसच्या काचेतून त्यांच्याकडे पाहत होतो.नि:शब्द होऊन.शेवटी काहीही झालं तरी सर्व भावना शब्दात व्यक्त करता येत नाही.शब्द अपुरे पडतात.पण ज्यावेळी शब्द अपुरे पडतात. त्यावेळी संपूर्ण जीवन जगण्याचा मार्ग आपल्याला सापडलेला असतो.सर्वांचे मनःपूर्वक आभार व धन्यवाद काही घटना व प्रसंग राहिलेले असू शकतात.


समाप्त .. २०२१ साली केलेल्या प्रवासाचे वर्णंन..


एकदा एका माणसाने आपल्या घराचं नूतनीकरण करायला सुरुवात केली.असे करतना भिंत तोडून उघडायला लागते.जपानी घरांच्या भिंती लाकडाच्या बनवलेल्या असतात.आणि त्यांत सहसा पोकळी असते.

तर,ही भिंत तोडताना त्या माणसाच्या असं लक्षात आलं की आतमध्ये एक पाल अडकून पडली आहे आणि भिंत सांधताना मारलेल्या एका खिळ्यात तिचा एक पाय चिणला गेला आहे.त्याला त्या पालीची अवस्था पाहून खूप दया आली आणि त्याचं कुतुहलही जागृत झालं,की हा खिळा जवळपास ५ वर्षां पूर्वी हे घर नवीन बांधलं

तेंव्हा ठोकला गेला होता.मग ५ वर्ष पाय चिणलेल्या अवस्थेत ही पाल जिवंत कशी राहिली असेल? असं काय घडलं होतं की त्या अंधार असलेल्या पोकळीत हालचाल न करता ती पाल जिवंत कशी रहिली? जे जवळ जवळ अशक्य होतं त्यानं त्याचं काम अक्षरशःथांबवलच आणि तो त्य पालीवर लक्ष ठेवून बसला,की ती आता कशी,काय खाते? काही वेळाने पाहता पाहता त्याला दिसले की तेथे दुसरी पालही आली आहे.आणि तिच्या तोंडात अन्न आहे आणि ती हळूहळू त्या खिळलेल्या पालीला ते अन्न भरवत आहे. हे पाहून तो माणूस अवाक झाला,गहिवरला.


कल्पना करा १ नाही,२ नाही तर ५ वर्ष न कंटाळता एक पाल आपल्या जोडीदाराची अशी सेवा करते,अजिबात आशा सोडून न देता.एक पाली सारखा नगण्य प्राणी आपल्या प्रिय जोडीदाराला सोडुन न जाता त्याची अशा प्रकारे काळजी घेतो,तर आपण माणसं यांपासून काही तरी नक्कीच शिकू शकतो.तेंव्हा,अडचणीत असलेल्या

आपल्या जवळ्च्या प्रिय व्यक्तीला नेहमी आधार द्या जेंव्हा तिला तुमची खरोखरच गरज असते,तेंव्हा. "तुम्ही" म्हणजे त्या व्यक्तीसाठी संपूर्ण दुनिया असू शकता.कोणतीही गोष्ट

(नातं,विश्वास) तुटण्यासाठी एक क्षणाचं दूर्लक्ष पुरेसं असतं,परंतु जोडण्यासाठी अख्खं आयुष्य पणाला लावावं लागतं. गोष्ट संपली.

अज्ञात..