* विजय गायकवाड | Vijay Gaikawad

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

६/२/२४

डॉयलॉग - गॅलिलिओ गॅलिली.. Dialogue - Galileo Galilei

गॅलिलिओनं (१९३२) लिहिलेलं 'डायलॉग कन्सर्निंग द टू चीफ वर्ल्ड सिस्टम्स' हे पुस्तक जगभर गाजलं.याचंच सुटसुटीत नाव म्हणजे 'डॉयलॉग'! या पुस्तकात कोपर्निकसची पद्धती आणि आधुनिक गतिशास्त्र यांच्यातला संबंध खूपच सोप्या रीतीनं गॅलिलिओनं उलगडला. 'डायलॉग' हे पुस्तक बुद्धिवंताला ज्या प्रमाणात समजेल आणि आवडेल,त्याच प्रमाणात सामान्यातल्या सामान्य माणसालाही समजेल याची काळजी घेत गॅलिलिओनं यात वैज्ञानिक दृष्टिकोन,रंजक आणि रसाळ भाषा आणि नर्मविनोदी पद्धत यांचा वापर केला.गॅलिलिओ एक भौतिकशास्त्रज्ञ,गणितज्ञ, खगोलशास्त्रज्ञ आणि एक तत्त्वज्ञ असं सगळंच काही होता! गॅलिलिओला 'आधुनिक खगोलशास्त्राचा आणि भौतिकशास्त्राचा पितामह' असंही म्हटलं जातं.इतकंच नाही तर 'आधुनिक विज्ञानाचा पितामह' म्हणूनही अख्खं जग गॅलिलिओला ओळखतं.त्या काळी गॅलिलिओला 'ताऱ्यांचा ख्रिस्तोफर कोलंबस' असंही म्हणत.प्रत्यक्ष निरीक्षण आणि तर्कशुद्ध विचार यांची सांगड घालून निष्कर्ष काढणारा गॅलिलिओ हा पहिलाच शास्त्रज्ञ म्हणता येईल.


गॅलिलिओ वैज्ञानिक तर होताच, पण तो एक उत्तम लेखक आणि कुशल वाक् पटूही होता.! 'सगळे प्राकृतिक नियम हे गणिती नियमांचं पालन करतात'असं पहिल्यांदा गॅलिलिओनं म्हटलं.


जवळजवळ १६ व्या शतकापर्यंत फारसे मोठे वैज्ञानिकही नव्हते.कोपर्निकस आणि केप्लर यांचा अपवाद सोडला तर ख्रिस्तपूर्व ३८४ साली जन्मलेल्या ॲरिस्टॉटलपासून ते गॅलिलिओच्या जन्मापर्यंत जवळजवळ २००० वर्ष ॲरिस्टॉटल आणि टॉलेमी यांचं तत्त्वज्ञान अणि ख्रिश्चन धर्म यांचा प्रचंड पगडा पाश्चात्त्य विचारसरणीवर खूपच मोठ्या प्रमाणात होता.


सूर्य पृथ्वीभोवती फिरतो किंवा दोन वस्तू खाली सोडल्या तर त्यातली जड वस्तू हलक्या वस्तूपेक्षा आधी जमिनीवर पडते,असं ॲरिस्टॉटल म्हणायचा.


 टॉलेमीनं त्याच्याच सुरात सूर भरला होता.ॲरिस्टॉटलनं मांडलेल्या विचारांच्या विरोधात किंवा चर्चच्या विरोधात बोललं तर लगेचच त्याच्यावर कारवाई करून त्याच्या कृतीला धर्मद्रोह ठरवून कठोरातली कठोर शिक्षा होत असे.ॲरिस्टॉटल आणि टॉलेमी या दोघांना विरोध करण्याची त्या काळी कोणामध्येच हिंमत नव्हती.ती हिंमत पहिल्यांदा वयाच्या अवघ्या २७ व्या वर्षी गॅलिलिओनं दाखवली.पृथ्वी सूर्याभोवती फिरते,असं त्यानं म्हटलं.


गॅलिलिओच्या आधी पोलंडमधल्या निकोलस कोपर्निकस आणि योहान केप्लर यांनी ॲरिस्टॉटलच्या मांडणीला विरोध केला.सगळे ग्रह सूर्याभोवती फिरतात,असं कोपर्निकस यानं मांडलं आणि ते लंबवर्तुळाकार कक्षेत फिरतात,असं केप्लर यानं मांडलं.मात्र चर्चच्या विरोधात जाण्याची ताकद त्यांच्यातही नव्हती.


१६२९ च्या नोव्हेंबर महिन्यात गॅलिलिओनं लिहिलेलं' 'डायलॉग कन्सर्निंग टू चीफ वर्ल्ड सिस्टिम्स' या शीर्षकाचं पुस्तकजगभर गाजलं. याचंच सुटसुटीत नाव म्हणजे 'डायलॉग' ! हे पुस्तक लिहिताना गॅलिलिओनं खूपच सावध भूमिका घेतली होती.आपलं म्हणणं थेट मांडण्याऐवजी टॉलेमी आणि कोपर्निकस यांच्यात होणाऱ्या संवादाच्या स्वरूपात त्यानं हे पुस्तक लिहिलं.

यामुळे तत्कालीन धर्ममार्तंड आपल्याला त्रास देणार नाहीत,असं गॅलिलिओला वाटलं.त्यानं सुरुवातीलाच कोपर्निकसच्या सिद्धान्ताची एक गोष्ट यात मांडली असून त्यात कोपर्निकसन ती गोष्ट गृहीत धरा,असं म्हटल्याचं लिहिल होतं,असं लिहिलं. थोडक्यात,चर्चनं आक्षेप घेतलाच तर आपण कोपर्निकस बरोबर असल्याचं कुठे ठामपणे म्हणतोय,असं सांगायचं असं त्यानं ठरवलं.हे पुस्तक लिहिताना कुठेही टोकाची भूमिका घ्यायची नाही,टीका करायची नाही,असं बरंच काही ठरवूनही जेव्हा गॅलिलिओ लिहायला लागला,तेव्हा मात्र त्याचा मुळातला टिंगलखोर स्वभाव जागा झाला आणि त्याचे संवाद चांगलेच परखड,रोखठोक आणि मसालेदार झाले, गॅलिलिओला लॅटिन आणि ग्रीक या दोन्ही भाषा उत्तम येत असल्या तरी त्यानं 'डायलॉग कन्सर्निंग टू चीफ वर्ल्ड सिस्टिम्स' हे पुस्तक मुद्दामच इटालियन प्राकृत भाषेत लिहून प्रकाशित केलं.हे पुस्तक त्यानं त्या काळच्या लॅटिन या तथाकथित उच्चभ्रूच्या भाषेत न लिहिता जाणीवपूर्वक मातृभाषेतून लिहिलं होतं.


'डायलॉग' या पुस्तकात कोपर्निकसची पद्धती आणि आधुनिक गतिशास्त्र यांच्यातला संबंध खूपच सोप्या रीतीनं गॅलिलिओनं उलगडला.या पुस्तकातले संवाद किंवा संभाषण चार दिवसांमध्ये विभागलेले दाखवले होते.

पहिल्या दिवशी ॲरिस्टॉटलच्या पद्धतीमध्येपृथ्वी आणि स्वर्ग यांच्यातल्या मूलतत्त्वामध्ये दाखवलेला फरक,दुसऱ्या दिवशी पृथ्वीचं रोजचं परिभ्रमण,

तिसऱ्या दिवशी पृथ्वीचं सूर्याभोवतीचं वर्षाचं फिरणं आणि चौथ्या दिवशी समुद्राची भरती-ओहोटी असं या पुस्तकाचं स्वरूप होतं. या पुस्तकात तीन माणसांचा संवाद मोठ्या नाट्यपूर्ण तऱ्हेने लिहिला होता.

'सिंप्लिसिओ' नावाचा एक जुनाट माणूस त्यात चितारला होता.तो त्या वेळच्या पोपप्रमाणेच काही तरी चुकीचं अवैज्ञानिक बोलतोय असं त्यात दाखवलं होतं; पण त्याचबरोबर सॅल्व्हिएटी नावाचा एक मनुष्य खगोलशास्त्रातले,कोपर्निकसचे आधुनिक विचार मांडताना दाखवला होता आणि सॅग्रडो नावाचा एक निवेदक दाखवला होता.सिंप्लिसिओ आणि सॅल्व्हिएटी यांच्यातल्या वादविवादात गॅलिलिओनं चातुर्यानं सिंप्लिसिओ जिंकतो असं वरवर दाखवलं असलं तरी 'सॅल्व्हिएटीचेच युक्तिवाद खरं तर बरोबर कसे आहेत असंच त्यातून व्यक्त होत होतं.चर्चच्या दृष्टीनं हे मात्र अतिच झालं होतं!या त्या वेळी पुस्तक प्रकाशित करण्यासाठी मुख्य चर्चची परवानगी घ्यावी लागत असे.

त्यामुळे ३ मे १६३० या दिवशी 'डायलॉग' पुस्तकाला चर्चची परवानगी मिळवण्यासाठी गॅलिलिओ स्वतः

आपल्या पुस्तकाचं बाड घेऊन रोमच्या दिशेनं निघाला; पण चर्चला गॅलिलिओचे निष्कर्ष न पटल्यामुळे पुस्तकाची प्रस्तावना आणि त्यातले निष्कर्ष पुन्हा चर्चच्या सूचनेप्रमाणे लिहावेत आणि मग गॅलिलिओनं या तात्पुरत्या स्वरूपात पुस्तक प्रकाशित करावं अशी चर्चनं त्याला परवानगी दिली.त्याच वेळी नेमकी प्लेगची साथ सगळीकडे थैमान घालत पसरत चालली होती.या धुमश्चक्रीतही गॅलिलिओनं अथक प्रयत्नांनी पुस्तकाच्या तीस प्रती छापल्या.याच पुस्तकात कूपमंडूक,संकुचित विचारसरणीच्या लोकांचं प्रतिनिधित्व करणारा सिंप्लिसिओ म्हणतो, 'आम्ही ॲरिस्टॉटल काय म्हणतो हे मानायचं नाही तर मग आम्हाला मार्गदर्शन कोण करणार?' त्या वेळी गॅलिलिओचं संग्रडो हे पात्र उत्तर देतं, 'आपल्याला अशा मार्गदर्शनाची गरजच का पडावी? आपल्याला कान,नाक, डोळे, हात आणि विचार करायला लावणारी बुद्धी मिळाली आहे.आपण स्वतंत्रपणे विचार करून यांचा वापर करायला हवा हे महत्त्वाचं नाही का?' अशा प्रकारचे संवाद लिहिताना गॅलिलिओला सगळ्या बाजू मांडताना,प्रत्येक बाजू बरोबरच आहे असं वाटण्याची ताकद त्या त्या संवादामध्ये असली पाहिजे याची जाणीव होती.'डायलॉग' हा ग्रंथ म्हणजे वाचकांसाठी बौद्धिक मेजवानीच होती.गोष्टीवेल्हाळ गॅलिलिओनं 'डायलॉग'मध्ये अनेक विषय हाताळले.

त्यामुळे त्याची व्यापकता वाढून तो एक अतिशय महत्त्वाचा ग्रंथ मानला गेला.


'डायलॉग' हे पुस्तक बुद्धिवंताला ज्या प्रमाणात आवडेल,त्याच प्रमाणात सामान्यातल्या सामान्य माणसालाही समजेल याची काळजी घेत गॅलिलिओनं यात वैज्ञानिक दृष्टिकोन,रंजक आणि रसाळ भाषा आणि नर्मविनोदी पद्धत यांचा वापर केला.गॅलिलिओनं लिहिलेलं 'डायलॉग' हे इतकं लोकप्रिय झालं की,त्या काळच्या पंडितांनाही ते पुस्तक वाचावं लागलंच. हे पुस्तक वाचताना गॅलिलिओनं काहीही स्पष्ट लिहिलं नसलं तरी लोक मात्र 'अरेच्च्या, हे पात्र हुबेहुब आपल्या पोपसारखंच आहे'असं म्हणायला लागले.


त्यातून पंडितांनी ते पुस्तक वाचून पोपचे कान भरायला सुरुवात केली.पोपच्या दरबारातले अनेक जण गॅलिलिओवर तसेही जळत होतेच. त्यांना गॅलिलिओची लोकप्रियता खटकत होतीच.गॅलिलिओच्या वादंग उठवणाऱ्या 'डायलॉग' या पुस्तकावर अखेर बंदी टाकण्यात आली.तसंच गॅलिलिओला रोमच्या पोपसमोर हजर होण्याचा आदेश निघाला.रोममध्ये पोहोचताच गॅलिलिओला पकडून सरळ तुरुंगात टाकण्यात आलं.त्या काळी चर्चचं स्वतंत्र न्यायालय असे.त्यामध्ये धर्माविरुद्ध कृती केलेल्यांचे खटले चालत.आरोप सिद्ध होण्यापूर्वी तुरुंगात डांबलेल्यांचा अतोनात छळही केला जात असे.

गॅलिलिओ हा धर्मद्रोही आणि पाखंडी असल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला होता.गॅलिलिओला कबुलीपत्रावर स्वाक्षरी करायला सांगितलं.आपण स्वाक्षरी केली नाही तर अतिशय क्रूरपणे ते आपल्याला ठार मारतील हेही त्याला दिसत होतं.तरीही सुरुवातीला सुनावणीच्या वेळी गॅलिलिओनं आपल्या छळाला न घाबरता आपण कुठल्याही वाईट हेतूनं हे पुस्तक लिहिलं नसून आपल्याकडून तसं कबूल करून घेणार असल्यास मी मृत्यूला जवळ करेन,असं स्पष्टपणे सांगितलं;पण शेवटी परिस्थितीसमोर गॅलिलिओनं हार मानली आणि


 दुसऱ्या सुनावणीच्या वेळी कबुलीपत्रावर अखेर स्वाक्षरी केली आणि पृथ्वी सूर्याभोवती फिरते,असं आपण पुन्हा कधीही म्हणणार नाही अशी बायबलवर हात ठेवून शपथ घेतो, असंही वचन दिलं; पण गॅलिलिओच्या कबुलीपत्रानंही पोपचं समाधान झालंच नाही.


त्याला अंधारकोठडीत डांबण्याचा आदेश पोपनं काढला.आयुष्याच्या शेवटी गॅलिलिओची दृष्टी पूर्णपणे गेली.जो माणूस ग्रहतारे बघायचा,विश्वाचं रहस्य उलगण्याचा प्रयत्न करायचा,माणसाला सत्याकडे नेण्याचा मार्ग दाखवायचा त्याच्या सभोवती फक्त अंधार आणि अंधारच उरला होता.


गॅलिलिओच्या अखेरच्या काळात अंधारकोठडीचा अस्कानिओ हा जेलर गॅलिलिओचा निस्सीम चाहता बनला होता.त्यानं अनेक नियम धाब्यावर बसवून गॅलिलिओला दुर्बीण बनवण्यासाठी एक चांगल भिंग उपलब्ध करून दिलं.त्यामुळे गॅलिलिओ न संपणाऱ्या रात्रीमध्ये आकाशातल्या ग्रहताऱ्यांचं निरीक्षण करू लागला.तसंच त्यानं गॅलिलिओच्या बुद्धीची कोंडी होऊ नये यासाठी अनेक वैज्ञानिक,कवी आणि संगीतकार यांना एकत्र करून गॅलिलिओबरोबर बोलण्यासाठी मोकळीक दिली.अस्कानिओच्या सहकार्यामुळेच गॅलिलिओच्या मनानं पुन्हा फिनिक्स पक्ष्याप्रमाणे उभारी घेतली आणि 'डिस्कोर्सेस (मीमांसा)' या अजरामर ग्रंथाची निर्मिती केली.


'डिस्कोर्सेस (मीमांसा)' या ग्रंथात गॅलिलिओनं पृथ्वीवरच्या पदार्थांना गती कशी मिळते याविषयी लिहिलं.हा ग्रंथ विज्ञानाच बायबल समजलं जातं.त्यानं काळ आणि अवकाश याबद्दल लिहिलेलं लिखाण वाचलं तर थक्क व्हायला होतं.त्यात गतीचे नियम आणि द्रव्याचे गुणधर्म यावर त्यानं लिहिलं.दृष्टी अधू झालेली आणि वृद्धत्वामुळे शरीराची साथ नाही अशा परिस्थितीतही गॅलिलिओच्या लिखाणाला कुठलीच शक्ती अडथळा आणू शकली नाही. त्याचं हे पुस्तक त्याला 'सगळ्यात आनंददायी' वाटायचं.'डायलॉग' मधलीच सॅल्व्हिएटी,

सॅग्रडो आणि सिम्प्लिसिओ ही पात्रं त्यानं 'डिस्कोर्सेस'

मध्ये घेतली आणि या पात्रांना सजीव करत आपलं म्हणणं मांडलं.हा ग्रंथ लॅटिन आणि इटालियन भाषेचे मिश्रण आहे.यात पदार्थांच्या गुणधर्माबरोबरच स्थापत्यशास्त्र,लष्करासाठी वापरलं जाणारं तंत्रज्ञान याविषयीही लिहिलं आहे.हा ग्रंथ वाचताना वाचकाजवळ केवळ कुतूहल असून उपयोगाचं नाही,तर त्याचं गणित आणि भूमिती या विषयांतलं आकलन चांगलं पाहिजे,कारण यातल्या युनिफॉर्म मोशनविषयीचं लिखाण गणिती भाषेत मांडलं आहे.'डिस्कोर्सेस'चं लिखाण पूर्ण होताच आता ते प्रसिद्ध करायचं कसं,हा मोठ्ठा प्रश्न गॅलिलिओसमोर होता.एके दिवशी फ्रेंच राजदूत काऊंट फ्रान्सिस द नोइ यानं चर्चची खास परवानगी काढून गॅलिलिओची भेट घेतली; पण काऊंट नोइला गॅलिलिओ भेटल्यावर नेमकं काय घडणार आहे हे ठाऊक नव्हतं. 


गॅलिलिओची भेट होताच गॅलिलिओनं मोठ्या विश्वासानं आपल्या आयुष्याची पुंजी म्हणता येईल असा महत्त्वाचा 'डिस्कोर्सेस' हा ग्रंथ त्याच्या हाती सोपवला.काऊंट नोइनं पॅरिसला पोहोचताच तो ग्रंथ तिथल्या लुडविक एल्गेवीर या डच प्रकाशकाच्या हातात दिला.१६३८ मध्ये तो लिडन इथे प्रसिद्ध झाला.चर्चनं गॅलिलिओच्या ज्ञानावर इतकी बंधनं घातलेली असताना गॅलिलिओचे अफाट परिश्रम,

चिकाटी आणि तीव्र इच्छा यांच्या जोरावर तो प्रसिद्ध झाला.याच काळात गॅलिलिओनं गणितावरचा 'द आसेयर' नावाचा ग्रंथ लिहिला.या ग्रंथात गणितासारख्या रुक्ष विषयावरची मांडणी अत्यंत रसाळ,समर्पक अणि रोचक भाषेत केलेली आहे.यातली चिकाला या कीटकाची गोष्ट तर खूपच मंत्रमुग्ध करणारी आहे.रोमच्या पोपलादेखील गॅलिलिओची ही चिकाल्याची गोष्ट खूपच आवडली होती.रोमच्या पोपला साहाय्य करणारा धर्मशास्त्राचा प्राध्यापक (पुढे तो फादर झाला) रिकार्डी यानं तर गॅलिलिओच्या या ग्रंथांची प्रशंसा करताना म्हटलं होतं, 


'गॅलिलिओच्या 'द आसेयर'नं या युगाचं वैभव वाढवण्यात मोलाची भर टाकली असून या ग्रंथात बावनकशी सोन्यासारखं सत्य युक्तिवादाच्या आधारानं मांडलेलं असून ते बघताना मी या काळात जन्माला आल्याचा मला अभिमान वाटतो.'


 'द आसेयर' या ग्रंथात गॅलिलिओनं विज्ञान आणि गणित यांचं ज्ञान मानवी आयुष्यात किती महत्त्वाचं आहे हे सांगून प्रत्येकानं या ग्रंथाची गणिती भाषा शिकली पाहिजे याचा आग्रह धरला.या ग्रंथात त्रिकोण,वर्तुळ आणि अनेक भौमितिक आकृत्या यांच्या भाषेत गॅलिलिओनं आपलं म्हणणं मांडलं होतं.त्याच्या प्रत्येक लिखाणातून त्याची युक्तिवाद करण्याची शैली आणि हातोटी लक्षात येते.

गॅलिलिओ म्हणायचा, 


'आकांडतांडव करून आपलं म्हणणं खरं करणारे लोक जास्त आणि सुसूत्र आणि सुबद्ध पद्धतीनं आणि युक्तिवादानं आपलं म्हणणं निष्कर्षापर्यंत पोहोचवणारे लोक खूप कमी असतात.माणसांना जितकी कमी माहिती असते,जितकं त्यांना कमी कळतं तितके ते लोक जास्त आत्मविश्वासानं बोलतात; पण याउलट ज्या लोकांना खूप ज्ञान मिळवायचं असतं,खूप गोष्टी शिकायच्या असतात आणि समजून घ्यायच्या असतात,ते लोक आपले शब्द नेमके,मोजके आणि खूप सावधगिरीनं वापरतात.' त्याचं हे वाक्य नंतर खूपच लोकप्रिय झालं.त्या काळी हॉलंडमध्ये गॅलिलिओचंच नाव झळकायला लागलं,कारण 


एके दिवशी हॉलंडच्या दरबारात समुद्रावरचे अचूक अक्षांश-रेखांश सांगणाऱ्या शास्त्रज्ञाला ३० हजार सुवर्णमुद्रा बक्षिसीदाखल मिळतील, असं जाहीर झालं.गॅलिलिओच्या कानावर ही बातमी पडताच त्यानं आपली जुनी बाडं शोधून त्यातलं नौकानयनावर लिहिलेलं आपलं लिखाण उघडलं.त्यात त्यानं सिलाटोन नावाच्या शिरस्त्राणाचा शोध लावला होता आणि त्याची निर्मितीही केली होती.गॅलिलिओनं डचांना ते कळवताच त्यांच्या सरकारनं ते विकत घेतलंच,पण बक्षिसीच्या रकमेबरोबरच ५०० सुवर्णमुद्रांनी गुंफलेला एक हार गॅलिलिओला सन्मानादाखल पाठवला.इतक्यावरच ते थांबले नाहीत,तर ॲमस्टरडॅमच्या ॲथेनाईयममध्ये त्याच्या नावाचं खास सिंहासन निर्माण केलं आणि गॅलिलिओ

विषयी आपल्याला वाटणारा आदर आणि प्रेम व्यक्त केलं.ज्या गॅलिलिओला रोमनं धिक्कारलं,ज्याचा छळ केला,त्याच गॅलिलिओला हॉलंडमध्ये इतकं नावाजलं जातंय बघून चर्चची मान शरमेनं खाली झुकली;

पण पराभव मान्य करण्याइतकं उदार मन त्यांच्याकडे नसल्यामुळे त्यांनी गॅलिलिओला परदेशी सोनं स्वीकारता येणार नाही असं सांगितलं.


गॅलिलिओनं 'डायलॉग','द आसेयर' याबरोबरच 'द लिट्ल बॅलन्स','ऑन मोशन','मेकॅनिक्स','द स्टारी मेसेंजर','लेटर ऑन सनस्पॉट्स','लेटर टू द ग्रँड डचेश ख्रिस्तिना','डिसकोर्स ऑन द टाईड् स,'डिसकोर्स ऑन द कॉमेट्स' आणि 'डिसकोर्स अँड मॅथमॅटिकल डेमॉन्स्ट्रेशन रिलेटिंग टू न्यू सायन्सेस' एवढं प्रचंड लिखाण केलं.


दान्तेच्या 'गेट ऑफ हेल' मधल्या नरकाचं स्वरूप दाखवण्यासाठी गॅलिलिओनं विज्ञानाचा आधार घेत मांडणी केली होती आणि ऐकणारे चकित झाले होते! गॅलिलिओवर विज्ञानाचा इतका प्रचंड पगडा होता की,सर्वसामान्यां- पर्यंत सोप्या भाषेत ते कसं पोहोचवता येईल याचाच ध्यास त्याला लागलेला असे.त्याचं लिखाण नेमकं,मुद्देसूद,तर्कशुद्ध याबरोबरच तितकंच रसाळ,रंजक आणि सौंदयांन भरलेलं होतं.त्याचं लिखाण वाचताना वाचकांसमोर अमर्यादित असा शब्दभांडार अनुभवायला मिळतो. विज्ञानाबरोबरच तत्त्वज्ञान आणि तत्त्वज्ञाना

बरोबरच विनोद आणि उपहासानं भरलेलं सामाजिक व्यंग तो अतिशय सुंदर वाक्यरचनेतून उलगडून दाखवत असे. गॅलिलिओच्या लिखाणाबद्दल भाष्य करताना,


 इटालियन टीकाकार नतालिनो सॅपेनो यानं म्हटलंय,'गॅलिलिओन आपल्या लिखाणातून मानवी मूल्यं मांडताना प्रभावी आशयघन शैलीचा वापर केलाय.गॅलिलिओनं अशा प्रकारचं लिखाण करून इटालियन साहित्यिकांच्या भावी पिढ्यांसाठी आदर्श घालून दिला आहे. वाचकाच्या मनःपटलावर ठसा उमटवणारा गॅलिलिओ- सारखा दुसरा साहित्यिक दुसरा होणे नाही.'


(जग बदलणारे,ग्रंथ दीपा देशमुख,मनोविकास प्रकाशन


अशा या आधुनिक विज्ञानाचा जनक समजल्या जाणाऱ्या गॅलिलिओचा जन्म १५ फेब्रुवारी १५६४ साली इटली

मधल्या टस्कनी प्रांतातल्या पिसा इथे विन्चॅन्सो गॅलिली आणि ज्युलिया अमान्नाती या जोडप्याच्या पोटी झाला.


उर्वरित भाग नंतरच्या लेखामध्ये…!

४/२/२४

जाणून घेऊ काही नोंदी...! Let's know some records..|

वाळवी,मुंगी-मुंगळे,मधमाशा हे आहेत तीन सर्वांहून प्रगत संघप्रिय कीटक.ह्यांच्यात आघाडीवर आहेत आग्या माशा - या आकाराने सर्वात मोठ्या मधमाशा.ह्या दरडींवर,

झाडांवर, मोठ्या इमारतींच्या वळचणीला मोठमोठी पोळी बांधतात.त्यांच्या पोळ्यांतल्या मधाच्या साठ्यावर डल्ला मारायला अस्वले,माणसे सरसावतात.या शत्रूवर आग्या माशा हल्ला करतात.त्यांना नांगीने डंख करतात.ती नांगी तुटते.त्याबरोबर कोथळा बाहेर पडून त्या मृत्युमुखी पडतात.पण असे आत्मघातकी हल्ले चेवाने करतात.

मधमाशा फुलांतल्या मधावर,परागांवर उपजीविका करतात.तो गोळा करण्यासाठी लांब-लांब जायला त्यांची तयारी असते.त्यात भरपूर कष्ट असतात.कदाचित जिवाला धोका असला,तरी त्यांना पर्वा नसते.तेव्हा एखादे झाड कित्येक किलोमीटर दूर अंतरावरही फुलले तरी तिकडे धाव घेतात.असे समृद्ध अन्नस्रोत बरोब्बर कुठे आहेत हे एकीला कळल्यावर बाकीच्या भगिनीमंडळाला ते ठिकाण व्यवस्थित सांगता आले तर मोठ्या झुंडीने तिथे पोचून मध-पराग गोळा करणे फारच लाभदायक ठरणार,

अशी माहिती एकमेकींना नेटकेपणे पुरवण्यासाठी मधमाशांनी एक प्रतीकात्मक नाचबोली विकसित केली आहे. एखादे घबाड सापडून तिथून मध,पराग गोळा करून एखादी मधमाशी पोळ्यावर परतली की ती पोळ्याच्या पृष्ठभागावर नाचायला लागते. तिचा उत्साह पाहात,त्याने आकर्षित होऊन दुसऱ्या मधमाशा तिची नक्कल करत,तिच्या मागेमागे स्वतःही नाचतात.या नाचाच्या दिशेतून मधाच्या स्रोताची दिशा कळते - कारण या स्रोताचा आणि सूर्याकडे पाहिल्यास सूर्याच्या दिशेचा जो कोन होतो,तो नाचाच्या दिशेशी नेटकेपणे जोडलेला असतो.नाचताना मधमाशा आपला पृष्ठभाग हलवत असतात.या कंबर घुसळण्याच्या वेगाचा आणि किती अंतरावर मधाचा स्रोत आहे याचाही संबंध नेटकेपणे जोडलेला असतो.मूळ स्रोत सापडवणारी माशी नाचत असताना तिने आणलेला मध,पराग यांच्या सुगंधावरून हे कोणत्या जातीचे झाड आहे याचाही अंदाज येतो. अशा त-हेने मागे-मागे नाचून इतर मधमाशा हा नवा, आकर्षक स्रोत कसला, कोणत्या दिशेला, किती अंतरावर आहे हे ताडतात आणि तडक तो हुडकायला निघतात.


सामान्यतः प्राण्यांचे संदेश इथे आणि आत्ता पुरते मर्यादित असतात.त्यांच्यात जास्त खोलवर अर्थ फार क्वचित दिसून येतो.पण मधमाशांच्या नाचबोलीतून त्या बऱ्याच वेळापूर्वी सापडलेल्या,दूरवरच्या मध-

परागांच्या स्रोताची माहिती एकमेकींना पुरवतात.हे साधू शकते कारण मानवी भाषेप्रमाणेच मधमाशांची नाचबोली ही एक सांकेतिक भाषा आहे. 


आपल्या भाषेत वेगवेगळे आवाज आणि अर्थ यांचा असाच सांकेतिक संबंध जोडलेला असतो. दोन वेगळ्या भाषांत एकाच ध्वनीचा अगदी वेगळा अर्थ असू शकतो.तो ठराविक संबंध संकेताची माहिती असल्यानेच समजतो. मी कर्नाटकात प्रथम गेलो आणि कानडी भाषा शिकण्याचा मनापासून प्रयत्न करायला लागलो. तेव्हा एका शब्दाने चक्रावलो.एका विद्यार्थिनींच्या शाळेत वक्तृत्व स्पर्धा होती.मुली जोरात उत्साहात भाषणे करत होत्या. सगळ्या मधूनमधून जोरात म्हणायच्या - हागु,हागु,

कानडीत हागु म्हणजे तसेच,मराठीत तर विष्ठा आणि हेच दोन ध्वनी उलट्या क्रमाने म्हटले, गुहा,तर त्याचा अर्थ आणखीच वेगळा.सगळे ध्वनी केवळ चिन्हे,खुणा,

निशाण्या आहेत. रूढीने त्यांना वेगवेगळे अर्थ चिकटतात. माणसाच्या दहा कोटी वर्षे आधी मधमाशा असे संकेत वापरू लागल्या होत्या!


मोराचा ह्या कसा पिसारा फुलला ?


आजन्म ब्रह्मचर्य पत्करलेल्या,आत्मसमर्पण करणाऱ्या कामकरी मुंग्या मधमाशांचे जनुक निसर्ग निवडीत का टिकून राहतात ह्या डार्विनच्या पहिल्या कूटप्रश्नाचा असा अंशत: उलगडा झालेला आहे.त्याला दुसरे गूढ वाटत होते ते होते मोराच्या पिसाऱ्याचे लोढणे काही धोका डोकावला तर सुटसुटीत लांडोरी चट्कन् उडू शकतात.पण मोरांना हे जमत नाही.त्यांना धावपट्टीवरच्या विमानासारखे पळत जाऊन,वेग घेऊन मगच उडता येते. 


शिवाय दर वर्षी एवढी पिसे वाढवण्यात भरपूर शक्ती वाया जाते.निसर्ग ही उधळपट्टी का सहन करतो? डार्विननी सुचवले की लांडोरी भला मोठा पिसारा फुलवणाऱ्या मोराकडे जास्त आकर्षित होत असाव्यात.स्वयंवरात अशा विशालपुच्छ मोरांना इतरांहून अधिक बायका मिळत असणार,आणि म्हणून जरी त्यांना मृत्यूचा जास्त धोका असला तरी त्यांचे गुणधर्म पुढच्या पिढीत अधिक प्रमाणात उतरत असणार. डार्विनच्या शब्दात अशी 'लैंगिक निवड' 'निसर्ग निवडी'वर मात करताना दिसते.(मधुमक्षिका,वारूळ पुराण नंदा खरे )


पण लांडोरी निष्कारण स्वतःचा जीव धोक्यात लोटण्याचा वेडगळपणा करणाऱ्या मोरांकडे का आकर्षित होतात ? आमोट्झ झहावी नावाच्या इस्रायली शास्त्रज्ञाने ह्याचे रहस्य समजावून दिले आहे.तो म्हणतो की लांडोरींना असे विशालपुच्छ मोर भावतात कारण त्यांचे भलेमोठे पिसारे हे ते भरभक्कम नर आहेत असे सिद्ध करतात. त्याच्या ह्या मांडणीला लोढण्याचा किंवा जोखडाचा सिद्धान्त अथवा धुरातत्त्व - handicap principle असे नाव दिले गेले आहे.कमकुवत नरांना मोठे लोढणे वाढवणे, पेलणे कुठून जमणार? इतर काही सोंगे घेता येतील,पण प्रचंड पिसारा बाळगायचे सोंग घेता येणार नाही - मोठा पिसारा हे बळकटपणाचे लक्षण असणारच.मोरांच्या स्वयंवरात लांडोरी ठरवतात की भपकेदार पिसारा फुलवणारा मोर सगळ्यात दणकट असला पाहिजे,अशा जोडीदाराचे आनुवंशिक गुण आपल्या पिल्लांत उतरले पाहिजेत,अन् त्याला पसंत करतात.जरी अशा मोराच्या डोईवर मोठा भार असला तरी त्याला भरपूर जोडीदारणी मिळाल्याने असे तोऱ्यात दिमाख दाखवणारे सौंदर्य जीवसृष्टीत फैलावत राहतो.थव्यात - घोळक्यात राहणाऱ्या सगळ्या पशु-पक्ष्यांत मोरासारखीच इतरांवर कुरघोडी करण्याची खटपट अखंड चालू असते. कारण ह्यात सरशी होणारे प्राणी जगण्या-फळण्यात जास्त यशस्वी ठरतात.म्हणून समाजप्रिय पशू असे सच्चे संदेश पुरवणारी नानाविध लोढणी गळ्यात बाळगून वावरत असतात - त्यांचा भपका ऐटीने मिरवत फिरत असतात.मोरांकडून धडे घेऊन थिओडोर व्हेब्लेन नावाच्या अर्थशास्त्रज्ञाने मानवाच्या चंगळवादी जीवन शैलीचे इंगित आपल्याला समजावून दिले आहे.व्हेब्लेन म्हणतो की हातात अतोनात पैसे खुळखुळायला लागले की माणसाला आपल्याला खरेखुरे उपयोगाचे काय आहे याचा विसर पडतो.त्याच्या डोक्यात येते की जगातले खरे सौंदर्य आहे दिमाखात,जीवनातली खरी खुमारी आहे दुसऱ्याला हिणवण्यात.मग तो आपण किती श्रीमंत आहोत,बेपर्वाईने किती अपव्यय करू शकतो हेच दाखवण्याच्या मागे लागतो.मानवी समाजात मोठी जोखीम सांभाळणाऱ्यांना धुरंधर असे बिरुद दिले जाते. गुरुचरित्रात सरस्वतीगंगाधर म्हणतो ना : होईल सुख संसारी । राज्य दिधले धुरंधरी ।। धुरंधरचा शब्दश: अर्थ आहे जोखड पेलणारा,लोढणे ओढणारा.असे लोढणे वागवण्यातून प्रतिष्ठा लाभते. संदेश : खरे आणि खोटे


प्राण्यांच्या जगातही फसवाफसवी चालतेच. सगळ्याच फुलपाखरांच्या थोड्या जातीच खास आकर्षक रंगांनी नटलेल्या असतात.ह्या एक तर असतात विषकन्या,नाही तर मायावती ! सुरवंटांपासून आपला बचाव करण्यासाठी रुईसारख्या काही वनस्पती विषारी चीक,किंवा इतर विषारी रसायने बनवतात.अशा वनस्पती बहुतेक जातीची फुलपाखरे टाळतात.पण असेही बहाद्दर सुरवंट आहेत,की जे हे विष सहन करू शकतात.म्हणजे पचवत नाहीत,पण आपल्या शरीरात साठवून ठेवतात.हे साठवलेले विष प्रौढ फुलपाखरांच्या शरीरात उतरते,आणि त्यामुळे कीटक

भक्षक पक्षीही त्यांच्या वाटेस जात नाहीत.मग अशा जातींत जोडीदारांना आकर्षित करून घेण्यासाठी रंगीबेरंगी बनले तरी पक्षी-सरड्यांना बळी पडण्याची किंमत मोजावी लागत नाही.पण निसर्ग संधिसाधू आहे.विषारी फुलपाखरे पक्ष्यांच्या तावडीतून सुटतात म्हटल्यावर त्यांच्या सारख्याच दिसणाऱ्या,पण बिनविषारी तोतयांचीही उत्क्रांती सुरू झाली.ह्या तोतयांना असतो दुहेरी फायदा,विष साठवायचे कष्ट नाहीत,तरीही शत्रूपासून बचाव होतो.ह्या सुंदऱ्या विषारी नाहीत,पण मायावी आहेत.काही डोकेबाज माकडांनी खोटे संदेश देण्यात ह्यापुढे मजल मारली आहे.माझे मित्र राणा सिन्हा ह्यांनी लालतोंड्या माकडांचा खोलात अभ्यास केला आहे.एकदा ते त्यांच्यातल्या एका प्रेमाच्या त्रिकोणाचे निरीक्षण करत होते.दोन नर एका माजावर आलेल्या मादीला वश करण्याचा आटोकाट प्रयत्न करत होते.शेवटी तिने एकाच्या बाजूने कौल दिला.


दुसरा नर निराश होऊन झाडावर चढला.आणि त्याने काय केले?त्याचा प्रतिस्पर्धी आणि त्या मादीचे मीलन सुरू होणार,तेवढ्यात त्याने जोरात बिबट्या आला रे आला,अशी धोक्याची आरोळी दिली.बिचारे प्रेमी सैरावैरा दोन दिशांनी दोन वेगवेगळ्या झाडांवर चढायला धावले.आणि हे महाशय? आपण शांतपणे झाडावरून उतरले!जर त्याला खरेच बिबट्या आला अशी आशंका असती तर तो कधीच झाडावरून उतरला नसता.उलट आणखी शेंड्यावर गेला असता. तो चक्क थापा मारत होता..!



२/२/२४

जेरिमिया इतिहासातील युद्धविरोधी… Anti-War in Jeremiah History...

जेरिमियाचा खटला झाला.सुरू झाला.न्यायाधीशासमोर तो उभा होता.त्याच्यावर ज्यांनी आरोप लादले होते,

त्यांच्यासमोर तो उभा होता. बोललेल्या शब्दांपैकी एकही शब्द मागे घ्यावयास तो तयार नव्हता.परंतु जे न्यायाधीश होते,त्यांचा जे आत्मा राजाच्या आत्म्यापेक्षा अधिक उदात्त होता.त्या धर्मात्म्याचे अलौकिक धैर्य पाहून ते विरघळले.

त्या महान संस्फूर्त पुरुषाने न्यायाधीशांना आपलेसे केले.त्यांनी दोषमुक्त ठरविले.


काही काळ जेरिमिया जेरुसलेम सोडून स्वतःच्या जन्मगावी जाऊन राहिला.परंतु तिथेही त्याला शांती नव्हती.त्याच्या क्रांतिकारक जहाल मतांमुळे भटभिक्षुक त्याच्यावर दातओठ खात होते.त्या भटभिक्षुकांनी काही गुंड हाताशी धरले. एकदा जेरिमिया एकटाच जात होता.रस्त्यात कोणी नव्हते.त्या मारेकऱ्यांनी त्याच्यावर हल्ला केला.जेरिमिया मोठ्या मुश्किलीने वाचला.तो कसातरी जिवानिशी सुटला.पॅलेस्टाईनमधील संस्कृतिसंरक्षक,नीतिधर्मरक्षक निराश झाले. परंतु त्यांनी जेरिमियाचा पिच्छा सोडला नाही. त्यांनी जेरिमियाच्या घरातील नोकरांना वश करण्याचे प्रयत्न केले.

जेरिमियाच्या अत्रात विष कालवले जावे,म्हणून त्यांनी उद्योग केले.परंतु तो कट जेरिमियाच्या लक्षात आला आणि तो वेळीच वाचला.तो पुन्हा जेरुसलेमला आला.


आपल्या देशबांधवांच्या दुष्टपणासमोर आरसा धरण्याचे स्वतःचे जीवितकार्य त्याने पुन्हा सुरू केले.


मंदिरात पुन्हा एकदा एक महोत्सव चालला होता.पुन्हा हा देवाचा खलिफा तिथे अकस्मात गेला.या वेळेस त्याच्या हातात मातीचा एक नवा खुजा होता.'प्रार्थना बंद करून माझ्या पाठोपाठ या',असे तो त्यांना म्हणाला.नंतर तो खुजा एखाद्या झेंड्याप्रमाणे हातात उंच धरून तो बाहेर पडला.ते मडके उंच धरून शहरातील सारी घाण जिथे नेऊन टाकीत असत,तिथे तो गेला. त्याच्याभोवती आता चांगलीच गर्दी जमली. त्या कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळ तो गेला.त्याने ते मडके तिथे फोडले व त्याचे तुकडे त्याने त्या कचऱ्यात फेकले,नंतर लोकांकडे तोंड करून तो म्हणाला,"याप्रमाणे तुमचे,तुमच्या या शहराचे मी तुकडेतुकडे करील." शांतताभंग करणारा, अव्यवस्थित वागणारा म्हणून त्याला अटक करण्यात आली.

घोड्याच्या चाबकाने त्याला फटके मारण्यात आले.रात्रभर त्याला खोडा देण्यात आला.सकाळी त्याला सोडून देण्यात आले.सुटल्याबरोबर पुन्हा तो लोकांसमोर उभा राहिला.ती शापवाणी त्याने पुन्हा उच्चारली. सर्वांना विस्मय वाटला.त्या पागल प्रेषिताची ती बंडखोरी,तो आडदांडपणा,ती निःशक,निर्भय स्पष्टोक्ती थांबविण्याचा उपाय त्यांना सापडेना.याच सुमारास उत्तरेकडून इजिप्त व दक्षिणेकडून बाबिलोन पॅलेस्टाइनचा चुराडा उडविण्यासाठी तयारी करीत होते.जात्याच्या दोन तळ्यांच्या मध्ये मूठभर दाण्यांचा चुरा व्हावा,तसे पॅलेस्टाइनचे होणार होते.जेरुसलेमच्या गादीवर या वेळेस झेडेका हा राजा होता.तो मागील राजांप्रमाणे नव्हता.

झेडेका शांतिप्रिय होता. परंतु तो दुबळ्या मनाचा होता.

सल्लागार जो जो सल्ला देतील, तसा तो वागे.नवे सल्लागार आले, तर पुन्हा निराळा विचार.त्याला'स्वतःचे'

निश्चित असे,मतच जणू नव्हते.पॅलेस्टाइन या वेळेस नावाला का होईना; परंतु बाबिलोनच्या अधिसत्तेखाली होते.बाबिलोनचे हे जू जणू काही फार जड नव्हते.

जेरुसलेममधील काही चळवळ्यांनी बाबिलोनच्या राजाविरुद्ध बंड पुकारावे असे राजाला सुचविले.परंतु ही गोष्ट होऊ नये म्हणून जेरिमियाने आकाशपाताळ एक केले.तो पुरतेपणी जाणत होता,की बंड होताच बाबिलोनचा राजा जेरुसलेमला वेढा घालील. त्या वेढ्यात जेरुसलेम टिकाव धरणार नाही ही गोष्टही स्पष्ट होती.

कोकराने सिंहांशी झुंजावे, तसा तो प्रकार झाला असता.

जेरुसलेममधले उतावळे लोक बंडासाठी फार मोठी किंमत द्यायला तयार होते.ते स्वतःचे प्राण द्यावयास तयार होते.इतकेच नव्हे;तर स्वतःच्या बायकामुलांचेही बलिदान करावयास ते सिद्ध होते.जेरुसलेम शहराचे केवळ स्मशान झालेले जेरिमियाच्या प्रखर कल्पनाशक्तीस दिसत होते. सर्वत्र प्रेतांचे खच पडले आहेत,तरुण स्त्रियांची विटंबना होत आहे.मुले पाण्याचा घोट मिळावा,भाकरीचा तुकडा मिळावा म्हणून दीनवाणी हिंडत आहेत,तहानलेले कुत्रे धन्याचे रक्त चाटीत आहेत,रस्त्यावर मृतांची व मृत प्राण्यांची शरीरे राशीवारी पडली आहेत,असे हे भीषण दृश्य जेरिमिया कल्पनाचक्षूनी पाहात होता.


त्या काळातील वेढा म्हणजे काय वस्तू असे,ते जेरिमिया ओळखून होता.म्हणूनच स्वतःचे सारे वक्तृत्व उपयोगी आणून त्या बंडाविरुद्ध तो प्रचार करीत होता.जेरिमिया म्हणाला, "बाबिलोनच्या राजाला सोन्याची खंडणी देणे पत्करेल,परंतु रणदेवतेला रक्ताचा नैवेद्य देणे नको."


थोडा वेळ राजा झेडेकाने जेरिमियाचे ऐकले, परंतु त्याच्या प्रमुख सल्लागारांचे मत लढाईला अनुकूल होते.याच सुमारास इजिप्तमधून एक लष्करी शिष्टमंडळ आले होते.सल्लागार राजाला म्हणाले,"इजिप्तच्या या लष्करी अधिकाऱ्यांस मेजवानी द्या. इजिप्तची मदत आपणास मिळावी म्हणून प्रयत्न करा."जेव्हा इजिप्तचे प्रतिनिधी जेरुसलेममध्ये आले,तेव्हा जेरिमिया मानेवर जू घेऊन रस्त्यावर आला.इजिप्शियन लष्करी अंमलदारांचे गणवेश झगमगत होते.त्यांची ती शस्त्रे लखलखत होती.आणि हा जेरिमिया कसा होता? भुरेभुरे केस,मेंढ्याच्या कातड्याचा तो गबाळ वेश आणि मानेवरील जड जोखडाने वाकलेली अशी त्याची ती करूणास्पद मूर्ती होती! तेथील तो विरोध डोळ्यांत भरण्यासारखा होता.लोकांनी विचारले, "मानेवरील या जोखडाचा अर्थ काय?'जेरिमिया म्हणाला,

"तुमच्या मुलाबाळांचा तलवारीला व दुष्काळाला बळी देण्यापेक्षा बाबिलोनचे जू परवडले हा याचा अर्थ.

"कितीतरी आठवडे जेरिमिया मानेवर जू घेऊन रस्त्यावरून जात होता.


 शेवटी एके दिवशी लष्करी पक्षाचा एक उत्साही सभासद हनानिआ याने ते जू ओढून घेतले व त्याचे तुकडे केले. ते मोडीत असता हनानिआ म्हणाला,"याप्रमाणेच बाबिलोनचे सर्व राष्ट्रांच्या मानेवर असलेले जू मी मोडून मोडून फेकून देईन."शेवटी लष्करी पक्षाचे धोरण विजयी झाले.झेडेकाने इजिप्तशी करार केला आणि इकडे बाबिलोनशी त्याने लढाई पुकारली.मूठभर लोक जेरिमियाच्या मताचे होते.परंतु राष्ट्रात सर्वत्र युद्धोत्साह संचरला होता.सारे युद्धाने कसे बेहोश झाले होते! अशा या गदारोळात जेरिमिया व त्याची मूठभर शांतिसेना यांचे कोण ऐकणार ?


बाबिलानच्या राजाचे नाव नेबुचदनेझर त्याने इजिप्शियनांना ताबडतोब शरण आणिले आणि जेरुसलेमला वेढा घातला.अशा वेळेस देशात शांतीची गोष्ट काढणे म्हणजे देशद्रोह होता.परंतु जेरिमिया शांतीचा संदेश देतच राहिला. तो म्हणाला, "युद्ध पुकारलेत,ही चूक केलीत.परंतु अजूनही बाबिलोनच्या राजाशी तह करण्यास हरकत नाही." तो याच्याही पुढे गेला.लढू न शकणाऱ्या सर्व नागरिकांस तो म्हणाला."मुलांनो,स्त्रियांनो,

म्हाताऱ्यांनो,दुर्बलांनो ! या शहरात उद्या उपासमारीने उंदराप्रमाणे मरण्याऐवजी तुम्ही खुशाल शत्रूकडे जा.तिथे तुम्हाला अन्नपाणी मिळेल,दवापाणी मिळेल. माझे ऐका." जेरिमिया हा पंचमस्तंभी आहे. बाबिलोनची बाजू घेणारा देशद्रोही आहे,असे सारे म्हणू लागले.खरे पाहिले तर जेरिमिया देशद्रोही नव्हता व बाबिलोनचा पक्षपातीही नव्हता.तो उदार हृदयाचा एक महात्मा होता. इतर सारे पिसाटाप्रमाणे वागत असता तो समतोल वृत्तीने वागत होता.युद्ध पुकारणाऱ्या राष्ट्रांना एक प्रकारचे आंधळेपण येत असते.जेरिमियाने स्वतःची दृष्टी निर्मळ ठेवली होती,डोके शाबूत ठेवले होते.लोकांनी जेरिमियाला पकडले.चौकशीचा देखावाही न करता राजवाड्याखालच्या एका अंधाऱ्या व दुर्गंधीमय अशा नरककुडांत त्यांनी त्याला टाकले.इकडे अद्याप वेढा होता.आणि तिकडे त्या नरकात जेरिमिया खितपत पडला होता.शेवटी गुप्तपणे राजाने त्याला बोलावले.राजा भ्याड होता.परंतु त्या निर्भय व उदार महात्म्याविषयी त्याला मनातल्या मनात आदर वाटे.जेरिमिया आपले विचार बदालावयास तयार नव्हता.सुटकेसाठी स्वतःच्या आत्म्याशी प्रतारणा करावयास तो तयार नव्हता. तो राजाला एवढेच म्हणाला,"या नरककुंडांतून काढून मला तुरुंगात ठेवा.मानवी प्राण्याला सडून मरायला या स्थानापेक्षा तुरुंग बरा."


राजाने ऐकले आणि राजवाड्यातच एके ठिकाणी त्याला स्थानबद्ध करण्यात आले. पुन्हापुन्हा तो झेडेकाना सांगत होता,की बाबिलोनच्या राजाला शरण जा.परंतु कोणी ऐकेना.त्या मूर्ख व हट्टी राजाचा अभिमान पार वाहून जाईल इतके रक्त अद्याप सांडले नव्हते.


नेबुचदनेझरने शहराभोवतालाचे पाश अधिकच आवळले.

शहरातील लोकांस काय करावे समजेना.आपला दुबळा राग कोणावरतरी काढावा,असे त्यांना वाटू लागले.त्यांना जेरिमियाच्या रक्ताची तहान होती.त्याच्या प्राणांवर ते उठले.स्वतःच्या हालअपेष्टातून आंधळे होऊन,जो एक पुरुष त्यांना या हालअपेष्टातून वाचवू पाहात होता,

त्याच्यावरच ते उठले.लोकांनी राजाला घेरले.जेरिमियाला पकडून चिखलाच्या खळग्यात टाका.असे ते म्हणाले.

चिखलाच्या एका खोल खळग्यात त्याला टाकण्यात आले.तो जसजसा धडपडे तसतसा, तो आणखी आणखी खाली जाई.त्याचे पाय वर निघतना जेरिमिया चिखलात बुडणार,गुदमरून मरणार ! सुदैवाने,एका निग्रो गुलामाला दया आली.त्याने जेरिमियाला चिखलातून दोरीने ओढून वर घेतले आणि वेळीच त्याचे प्राण वाचविले.जेरिमिया कोठे पळून गेला नाही. स्वतःचे जीवितकार्य त्याच्यासमोर होते.तो पुन्हा राजाकडे गेला.ही शेवटची वेळ होती. शत्रूजवळ,'ताबडतोब तह करा'असे पदर पसरून त्याने मागणे मागितले.परंतु झेडेकाने त्याला पुन्हा दूर घालविले,आणि वेढा चालूच राहिला.


पुढे अठरा महिन्यांनी शहर घेतले गेले.ज्यू राजाचे मुलगे ठार मारण्यात आले.पित्याच्या डोळ्यांदेखत पुत्रांचे वध झाले.नंतर झेडेकाचे डोळे काढण्यात येऊन त्याला शृंखलाबद्ध करून बाबिलोनला नेण्यात आले.

बाबिलोनच्या दरबारात जेरिमियाला मानाची एक जागा देऊ करण्यात आली.परंतु स्वतःच्या राष्ट्राचे तुकडे करणाऱ्या खुनी शत्रूशी त्याला काही एक कर्तव्य नव्हते.तो आपल्या देशबांधवांबरोबर वनवासात गेला.जेरिमियाला देशद्रोही समजून झेडेकाने छळले.बाबिलोनच्या राजाने मूर्ख म्हणून त्याला हाकलून दिले.


जेरिमियाचे शेवटी काय झाले ते नक्की माहीत नाही.परंतु काही प्राचीन इतिहासकारांचा पुरावा खरा मानला,तर जेरिमियाला इजिप्तमध्ये दगड मारून ठार करण्यात आले,असे म्हणावे लागते.रानवट लोकांना जेरिमियाने उपदेशिले,"तुम्ही सज्जन माणसे बना;तुमच्यापासून प्रभूला ही अपेक्षा आहे."परंतु त्या रानवटांना तो अपमान वाटला.त्यांनी त्याला ठार केले.


मायकेल एंजेलो या विख्यात चित्रकाराने जेरिमियाचे फार योग्य अशा स्थितीत चित्र काढले आहे.वृद्ध जेरिमिया निराश व भग्न हृदय असा बसलेला आहे.सभोवती सारे शहर उद्ध्वस्त झालेले आहे.शहराच्या त्या ढिगाऱ्यावरच जेरेमिया बसलेला आहे.त्याचे डोळे जमिनीकडे खाली जसे खिळलेले आहेत! आजूबाजूचे दुःख व विनाश पाहण्याचे त्याला धैर्य नाही.तो डोळे वर करू शकत नाही.


त्याचे जीवन म्हणजे उद्विग्न करणारी विफलता होती. त्याने शांतीचा संदेश दिला;परंतु जगाने तो ऐकला नाही.लक्ष न देणाऱ्या जगाला त्याने शांतीचे उपनिषद दिले. स्वतःच्या नगरीचे वैभव राहावे,राष्ट्राचा प्राण वाचावा म्हणून त्याने प्राणपर कष्ट केले.परंतु धूळ व राख यांच्या राशीखाली जेरुसलेम गडप झाले.आणि तेथील नागरिक वाळूच्या कणांप्रमाणे जगभर वारेमाप फेकले गेले.त्या थोर इटालियन चित्रकाराने जेरिमिया म्हणजे 'मृतप्राय जातीचा पराभूत व भग्नमनोरथ असा प्रेषितच' जणू रंगविला आहे.परंतु मायकेल एंजेलोचे हे चित्र कित्येक शतकांपूर्वीचे आहे.


आज जेरिमियाला आपण निराळ्या प्रकाशात पाहू शकतो.जुडा येथील टेकड्यांवर उभा राहून जेरिमिया विजयी मुद्रा धारण करून शेकडो,हजारो वर्षांच्या अंतरावरून पाहात आहे.२५०० वर्षांपूर्वी त्याने जी वाणी उच्चारली,ती वाऱ्यावर गेली.परंतु त्याचे ते शब्द आता पकडले गेले आहेत.ज्यू लोकांचे जे अविशिष्ट असे विस्कळीत राष्ट्र आहे,त्याने जेरिमियाचे ते शब्द परंपरेने आजपर्यंत आणून पोहोचविले आहेत.त्या शब्दांचा प्रतिध्वनी निःशस्त्रीकरणाच्या सभांतून,जागतिक न्यायमंदिराच्या विचारविनिमयातून,राष्ट्रसंघाच्या बैठकींतून ऐकू येत आहे.जेरिमिया उभा आहे. स्वत:च्या परिश्रमाला येणाऱ्या फळांकडे तो लांबून पाहतो आहे.त्याच्या सौम्य मुखमंडलावर विजयाचे मंद स्मित झळकत आहे.

जीवनाचा खरा मार्ग शांतीचा आहे,ही गोष्ट अस्पष्टपणे का होईना,आता मानवाच्या ध्यानात येऊ लागली आहे.


अत्याचाराचा प्रतिकार करू नका.असे सांगणारा जेरिमिया हा महान आचार्य होता.सर्व इतिहासातील अत्यंत प्रचंड व भव्य अशा चळवळीचा तो संस्थापक होता.


३१.०१.२४ या भागातील शेवटचा भाग..हा भाग संपला…

३१/१/२४

जेरिमिया पहिला युद्धविरोधी… Jeremiah the first anti-war...


मूसाच्या मृत्यूनंतर काही शतकांनी आपण जगाचे आपण दर्शन घेऊ या.संस्कृती व सुधारणांच्या दिशेने मानव-कुटुंबाने काही पावले टाकलेली आपणास दिसतील.

ते पहा फोनिशियन लोक,व्यापाराची व सत्तेची त्यांना फार हाव,मोठमोठी लांब- रूंद गलबते त्यांनी बांधली.

समुद्रावरून जाताना सुरवंटाप्रमाणे ती दिसत.भूमध्य समुद्राच्या किनाऱ्याभोवती कितीतरी भराभराटलेली नवीन शहरे त्यांनी वसविली;गजबजलेल्या वसाहती निर्मिल्या. भूमध्य समुद्र म्हणजे बहरलेल्या बागेतील जणू एक लहानसे तळे, असे वाटू लागले,फोनिशियन लोक अती धूर्त,त्यांना प्रामाणिकपणा ठाऊक नव्हता,

सद्सद्विवेकबुद्धी त्यांना माहीत नव्हती. नफेबाजी हाच त्यांचा धर्म व भरलेली तिजोरी हे त्यांचे ध्येय.परंतु त्यांनी नवीन लिपी शोधून काढली.इजिप्शियनांची ती चित्रचिन्हालिपी किंवा सुमारियनांची ती शरलिपी-त्या साध्या नव्हत्या,फार घोटाळ्याच्या व अवजड अशा त्या लिप्या होत्या.फोनिशियन लोक व्यापारी व व्यवहारी,त्यांना सुटसुटीत व झपझप लिहिता येईल अशी लिपी हवी होती.त्यांनी लिपी सोपी केली व अक्षरे बावीसच केली.हीच लिपी थोड्याफार फरकाने आजच्या बहुतेक सुधारलेल्या देशांतून सुरू आहे.


फोनिशियन लोक दर्यावर्दी व्यापार करीत होते. आशियातील कला व हत्यारे ते युरोपात आणत होते.

आफ्रिकेतील राष्ट्रांना देत होते.त्याच वेळेस खुष्कीने व्यापार करणारे कारवानांचे तांडे चीनमधील रेशीम व चिनी मातीची भांडी आणून त्यांऐवजी मध्य आफ्रिकेतील हस्तिदंत,स्पेन व ब्रिटनमधून जस्त,तसेच इतर देशांतून लोखंड, तांबे,पितळ,सोन्या-चांदीचे नक्षीदार दागिने, मसाले,मौल्यवान हिरेमाणके वगैरे घेऊन जात.हे कारवान पर्शिया व अरबस्तान यातील वाळवंटातून प्रवास करीत येत.तो जो पहिला वानरसदृश क्षुद्र मानव,त्याचे वंशज आता मोठ्यामोठ्या शहरांतून राहायला शिकले होते.सुंदर सुंदर वस्तूंनी स्वतःची शरीरे शृंगारावीत;स्वतःची घरे शोभवावीत,आपली मंदिरे भूषवावीत असे त्यांना वाटू लागले होते. चाकांचा व रथांचा शोध लागला होता.

रानटी घोडा माणसाळविण्यात आला होता.आता आपण वाऱ्यालाही मागे टाकू,असे मानवांना वाटू लागले.

संस्कृतीची परम सीमा आपण गाठली, असे त्यांना वाटले.मिळविण्यासारखे आता जणू काही राहिले नाही.

इजिप्तमधील ज्यूंचे ते महानिर्याण,सालोमनचे मंदिर,

टोजनयुद्ध व होमराची महाकाव्ये या गोष्टी आता फार जुन्या झाल्या,असे त्यांना वाटू लागले.मध्ययुगातील ती धर्मयुद्धे जशी आज जुनी पुरानी वाटतात, तसेच त्या लोकांना त्या प्राचीन युद्धांविषयी वाटे.


इजिप्त,असीरिया व बाबिलोन यांच्यात 'ज्यूंना आधी कोण गिळंकृत करतो',याची जणू आता स्पर्धा चालली होती.आणि सिथियन,इराणी व मीडीस हे इजिप्त,

असीरिया व बाबिलोन यांना गिळंकृत करू पाहात होते,पहिला मान मिळविण्यासाठी धडपडत होते.


ख्रिस्तशकापूर्वीच्या सातव्या शतकाच्या अंती आपण उभे आहोत.पृथ्वीवरची बलाढ्य राष्ट्रे एकमेकांचा निःपात करण्यात निमग्न आहेत असे येथे दिसत आहे.आणि अशा वेळेस पॅलेस्टाईनमधील एका लहान गावात एक तरुण वाढत होता.या साऱ्या लढाया म्हणजे मूर्खपणा आहे,असे तो म्हणू लागला होता.युद्धपराङ्‌मुख अशा त्या नवशांतिवाद्याचे नाव काय? त्या तरुणाचे नाव जेरिमिया…!


जेरिमियाच्या जीवनकथेभोवतालच्या सर्व कल्पनारम्य कथा आपण दूर करू या.


अर्वाचीन मानसशास्त्राच्या कठोर प्रकाशात हे जीवन अभ्यासू या.या जीवनातील भव्यता तोंडात बोट घालायला लावते,हा महात्मा आजही जिवंत असता,

तर आजच्या काळाच्या हजारो वर्षे तो पुढे आहे,असे म्हणावे लागले असते.अत्याचार शांतपणे सहन करा,

असे तो सांगे.त्याचा हा धीरोदात्त संदेश आजही बधिर कानांवरच पडेल,उपड्या घड्यावर पाणी ठरेल.

आजच्या या सुधारलेल्या विसाव्या शतकातही ती शिकवण झेपणार नाही,पचणार नाही. 


मग स्वत:च्या काळात तो एक वेडा मनुष्य म्हणून ठरला,यात आश्चर्य ते काय? 


त्याच्या समकालीनांनी त्याला वेडा म्हणूनच वागविले.खेड्यातील एक धर्मोपाध्यायाचा तो मुलगा होता.बापाचा धंदा त्याने पुढे चालवावा या हेतूने त्याला धर्माचे शिक्षण देण्यात आले होते.लहानपणी त्याने देशभर पसरलेल्या ज्या धर्मोपदेशकां विषयी पुष्कळसे ऐकले असेल,ते ज्यू प्रेषित मोठे चमत्कारिक व जहाल मताचे असतात,असे त्याने ऐकले.भटाभिक्षुकांना त्या प्रेषितांचा उपयोग नसे.ते प्रेषित म्हणजे भिकारडे जीव.गिरिकंदरांत ते राहात;कंदमुळे खात;ते बहुतकरून गरिबीत जन्मलेले असत. शेतकऱ्यांपैकी असत.कधी कधी ते गवतसुद्धा खात.फुले,मध यांवरही जगत.ईश्वराची इच्छा काय,ते आम्हीच फक्त सांगू शकू.असे लोकांना ते ओरडून ओरडून सांगत.जेरिमियाचा पिता एक अहंकारी उपाध्याय होता.

त्याचे नाव हिल्किया. त्या ज्यू प्रेषितांचे वरीलप्रमाणे चित्र त्याने आपल्या मुलासमोर अनेकदा रंगविले असेल. सुशिक्षित पॅलेस्टाईन मनुष्य अशा भिकारड्या फकिरांना आपल्या घरी कधी बोलावील,हे शक्य नव्हते.त्या ज्यू धर्मप्रेषितांचे विचार चमत्कारिक असत.एवढेच नव्हे; तर ते विचार ज्या भाषेत व ज्या पद्धतीने ते मांडीत,ती भाषा व ती पद्धतीही मोठी चमत्कारिक असे.


त्यांची वागणूकही विचित्र असे.उदाहरणार्थ,इसैआ जेरुसलेमच्या रस्त्यांतून दिगंबर फिरे.'या शहराने जे अपरंपार पाप केले आहे त्याचे प्रायश्चित म्हणून सर्व नगरवासियांना उघडे व्हावे लागेल;त्यांच्या अंगावर चिंधीही राहणार नाही,'हे पटविण्यासाठी तो तसा नग्न होऊन हिंडे.दुसरा एक प्रेषित,स्वतःची भाकरी खाण्यापूर्वी तो ती अपवित्र करी,मलीन करी व म्हणे,ईश्वर या राष्ट्राला असेच धुळीस मिळविणार आहे.यामुळे हे असले विचित्र प्रेषित उपहासास्पद होत असत.विशेषतः प्रतिष्ठित वर्ग तर या अवलियांची खूपच टिंगल करी.परंतु जेरिमिया जसाजसा वयाने मोठा होऊ लागला,तसतशी त्याला नवीन दृष्टी आली. वेड्याप्रमाणे दिसणाऱ्या त्या ज्यू प्रेषितांकडे तो निराळ्या दृष्टीने पाहू लागला.हे प्रेषित नेहमी गरिबांची बाजू घेतात, छळकांची बाजू न घेता छळल्या जाणाऱ्यांची घेतात,ही गोष्ट जेरिमियाच्या ध्यानात आली.


त्या प्रेषितांना न्यायाची तहान होती.जगात न्याय असावा, म्हणून ते तडफडत असत.त्यांचे धैर्य असामान्य असे.

राजाच्या राजवाड्यात शिरून प्रत्यक्ष त्याच्या तोंडावर त्याच्या जुलमांविषयी ते जळजळीतपणे बोलत.त्याची कानउघाडणी करीत.भय त्यांना माहीत नसे.

मंदिरातील पूजाविधींचे पोकळ अवडंबर त्यांना मुळीच खपत नसे.या दिखाऊ अवडंबराविरुद्ध त्यांचे बंड असे.ईश्वराला तुमच्या पूजाअर्चाची,तुमच्या प्रार्थनांची व यज्ञांची जरूर नाही असे ते उद्घोषित,

तुम्ही न्यायाने वागावे व सर्वांवर प्रेम करावे,तुम्ही दयाळू व मायाळू असावे,हीच ईश्वराची इच्छा आहे;प्रभू एवढेच तुमच्यापासून अपेक्षितो,असे ते सांगत.जेरिमियाला आणखी एक गोष्ट दिसून आली ती ही,की या धर्मप्रेषितांना शांतीचा ध्यास होता.ते धर्माचे प्रेषित निःशंकपणे पुढील भविष्यवाणी बोलत."असा एक दिवस येईल,की ज्या वेळेस तुम्ही तुमच्या तलवारी मोडून त्यांचे नांगर बनवाल;भाले मोडून त्यांचे विळे कराल;शेतीची व बगिच्यांची हत्यारे,अवजारे बनवाल."असे बोलणे म्हणजे साधी गोष्ट नव्हती. ती एक धीरोदात्त अशी गोष्ट होती.अती मंगल व गंभीर अशी ती वाणी असे.परंतु ते शांतीचे उपनिषद कोण ऐकणार? "एका राष्ट्राने दुसऱ्या राष्ट्राविरुद्ध कधीही तलवार उपसू नये, कोणत्याही राष्ट्राने युद्ध कसे करावे,ते अतःपर शिकू नये."ही त्यांची शिकवण.थोर उदात्त शिकवण.पुरेत आता युद्धे;पुरेत हेवेदावे;पुरेत द्वेषमत्सर;आता हल्ले नाहीत;वेढे नाहीत; रक्तपात नकोत;दुष्काळ नकोत;दुर्भिक्ष्य नको; रोग नकोत,साथी नकोत;हे त्या धर्मप्रेषितांचे निश्चित ध्येय होते.यासाठी त्यांना जगायचे होते. यासाठी मरायचे होते.जेरिमियाला स्पष्टपणे वाटे की,हे प्रेषित खरोखर दैवी प्रेरणेने संस्फूर्त झालेले आहेत.एक दिवस स्वतः

जेरिमियाही असाच संस्फूर्त कशावरून होणार नाही ? जसजसा तो या विचारांकडे अधिकाधिक लक्ष देऊ लागला,तसतसा तो जरा वेड्यापिश्यासारखा वागू लागला.त्याला स्वप्ने पडत.त्याला नाना दृश्ये दिसत.अद्भुत साक्षात्कार घडत.ईश्वर आपणास नवीन दर्शने घडवीत आहे;नवीन दृष्टी देत आहे, असे त्याला वाटू लागले.

ईश्वराची ही इच्छा जेरुसेलमच्या रहिवाश्यांना नीट समजावून सांगितली पाहिजे,असे त्याला वाटू लागले.दैवी उन्मादाने तो जणू मस्त झाला.थोर कवी,जहाल विचारसरणीचे क्रांतिकारक लोकनायक दिव्य प्रेरणेने असेच वेडे होत असतात.जेरिमिया प्रभुमत्त व शांतिमत्त झाला.प्रथमप्रथम तो लहानसहान वाईट गोष्टींविषयी बोले.बारीकसारीक गोष्टींवर तो टीका करी.आपले देशबांधव दुसऱ्या बलाढ्य राष्ट्रांचे कौतुक करीत आहेत,

असे त्याने पाहिले.त्या बलाढ्य राष्ट्रांप्रमाणे आपले राष्ट्र बलाढ्य व्हावे,असे त्याच्या देशबांधवांना वाटत होते.

जेरिमिया त्यांना म्हणाला,"दुसऱ्यांचे अनुकरण करू नका. स्वतःशी सत्यनिष्ठ रहा."पूर्वी होऊन गेलेल्या प्रेषितांप्रमाणे तोही लोकांची,क्षुद्र गोष्टीविषयीच्या त्यांच्या आसक्तीसाठी खरडपट्टी काढी.राजाला त्याच्या जुलमाविषयी स्पष्ट शब्दांत तो सांगे. एकदा तेथील मुख्य मंदिरात महोत्सव होता. मोठमोठे अधिकारी उपस्थित होते.स्वतः राजाही तिथे हजर होता.इतक्यात एकदम तो तरुण जेरिमिया तिथे आला.त्याचे केस पिंजारलेले होते;डोळे जणू तेजाने पेटलेले होते;तो एखाद्या उन्मताप्रमाणे हातवारे करीत होता;तो एकदम तेथील समारंभात घुसला व तेथील प्रार्थनांना त्याने अडथळा आणला.समजा,आत चर्चमध्ये प्रार्थना चाललेली असावी;आणि एखाद्या समाजसत्तावादी माणसाने तिथे येऊन धर्मावर तोंडमुख घ्यावे.मग तिथे किती गडबड व प्रक्षोभ होईल,त्याची कल्पना आपण करू शकतो.तोच प्रकार जरा अधिक तीव्रतेने तिथे झाला.ते धर्मोपाध्याय रागावले.राजा संतापला,इतर भक्तगणांना सात्त्विक चीड आली.काही वेळाने सारे स्तब्ध होते.जेरिमिया त्यांच्यावर वाग्बाणांचा वर्षाव करीत होता."चोऱ्या करता,खून करता, व्यभिचार करता;आणि ही सर्व पापे करून येथे माझ्यासमोर येऊन उभे राहता? हे माझ्या नावाने स्थापिलेले मंदिर,येथे का चोरांचा मेळावा जमावा? हे मंदिर की,चोरांच्या अड्ड्यांची जागा? तुम्ही असत्यवादी,लफंगे,खुनी आहात.मोठ्यांपासून छोट्यांपर्यंत सारे पापी आहात. 


पक्ष्यांचे घरटे जसे पिला-पाखरांनी गजबजलेले असते,तशी तुमची घरे पापांनी व वंचनांनी भरलेली आहेत.तुम्ही धष्टपुष्ट झाला आहात,लठ्ठ झाला आहात, धनकनकसंपन्न असे मान्यवर झाला आहात.परंतु अनाथ व पोरके तुमच्या नावाने खडे फोडीत असतात.जे गरीब आहेत,ज्यांना पदोपदी वाण आहे,असे सारे लोक तुम्ही पापात्मे आहात,

धर्ममर्यादांचे उल्लघंन करणारे आहात,याला साक्षी आहेत." "म्हणून प्रभूसमोर तुमचा नक्षा उतरवला गेलाच पाहिजे.तुमचा गर्व धुळीस मिळाला पाहिजे. वाळवंटातील एखाद्या प्रेताप्रमाणे हे तुमचे शहर होईल.उत्तरेकडून लांडगे येतील.आणि तुम्हाला फाडून खातील." (मानवजातीची कथा,हेन्री थॉमस, अनु-साने गुरुजी) 


अशी ही मर्मातिक टीका व निंदा कोण कोठवर सहन करणार? ते सारे धर्मपूजक जेरिमियाच्या अंगावर धावून आले. 'ठार करा याला', असे सारे ओरडले.राजा शांत होता.त्याने जेरिमियाच्या बचावासाठी काही केले नाही.

जमावाने मन मानेल तसे वागावे असे जणू तो सुचवत होता त्यांच्या इच्छेच्या आड तो नव्हता.


इतिहासातील पहिला युद्धविरोधी वीर जेरिमिया


राहिलेला शिल्लक भाग पुढील लेखामध्ये..

२९/१/२४

आयुष्य एक पुस्तक-Life is a book..!

माणूस हा परिस्थितीचे अपत्य नसून परिस्थिती माणसाचे अपत्य असते.-बेंजामिन डिझरेली


मानवी आयुष्यात काही घटना प्रसंग माणसाला परत परत विचार करायला भाग पाडतात.तो घटना आणि प्रसंग काहीतरी नवीन शिकवणारा असेल तर तो 'जिवंत' विचार रात्र दिवस माणसाचा पाठलाग करतो. त्याला काही चैनच पडत नाही.


असाच एक प्रसंग मला विचार करण्याचे काम देवून गेला.

तो २६ जानेवारी २०२४ रोजी घडला. निमित्त होते.'मॅट्रिक फेल' विजय पुस्तकांच्या विश्वात' लोकमत या वृत्तपत्रात आलेला माझा लेख (वृत्तपत्र हे ज्ञानाचे स्तोत्र असते.) दुसऱ्या दिवशी मी नियमाप्रमाणे कामावरती गेलो त्या दिवशी हा लेख वाचून 'शिवप्रसाद कात्रे' कोल्हापूर वय ७१ वर्ष यांनी मला फोन केला पण कंपनीमध्ये फोन वापरायची परवानगी नसल्या कारणाने माझा फोन आठ तास बंद अवस्थेत असतो.मग त्यांनी शोधा शोध करून हा लेख लिहिणारे 'भरत बुटाले'यांना फोन लावून विचारले की मी विजय ला फोन लावत आहे.पण त्यांचा फोन बंद लागतो आहे.आपण दोघेजण त्यांना भेटायला जाऊ लेख खूपच छान लिहिला आहे.आणि सध्याच्या या जगामध्ये अशी लोक आपल्या आसपास आहेत याचंच आश्चर्य वाटतं आहे,आपण जाऊ लवकरच…. सायंकाळी मला  भरत बुटाले साहेबांचा फोन आला,व त्यांनी घडलेली घटना मला सांगितली.संध्याकाळी पाच नंतर त्यांचा तुम्हाला फोन येईल असं त्यांनी मला सांगितलं.


त्या दिवशी फोन आला नाही म्हणून मी त्यांच्याकडून त्यांचा नंबर घेतला व त्यांना फोन केला.त्यांनी मला मी टोप मध्ये कुठे राहतो,कुठे काम करतो ही विचारपुस केली.व भेटू असे म्हणाले.२६ जानेवारी दिवशी सुट्टी होती.

त्यांचा मला फोन आला मी भेटायला येतो म्हणून मी म्हणालो हो,यावेळी मी पुरुषोत्तम अग्रवाल यांचे कबीर कबीर पुस्तक वाचत होतो.वाट पाहत होतो त्यांच्या येण्याची आणि त्यांचा फोन आला. त्यांना मी सामोरा गेलो.त्यांना पाहिल्यानंतर 


खलील जिब्रान यांनी द प्रॉफेट या पुस्तकांत म्हटलेलं वाक्य आठवलं झाडाचं एक जरी पान सुकून पिवळं झालं तरी त्यामागे समग्र वृक्षाचं मौन जाणतेपण उभं असतं." 


मानवी जीवनातील सुखदुःखाच्या खाच खळग्यांनी भरलेलं तरीही समृद्ध आयुष्य जगलेले व्यक्तिमत्व माझ्यासमोर उभं होत.घरी घेऊन आलो आणि आमच्यात सुरू झाला एक जिता जागता संवाद …!


त्यांना वर्षाकाठी काही ठराविक रक्कम मिळते त्यामध्ये संपूर्ण वर्षं ते काटकसरीने जगतात. त्यामध्ये मोबाईल रिचार्ज,चार चाकी गाडीचा पेट्रोल खर्च,महिन्याचे किराणा व इतर संसारिक खर्च महिन्यासाठी आठ ते नऊ हजार रुपये एवढीच मर्यादा आहे.मग त्यांनी सांगितला आपला जीवनक्रम जगण्याचा,माझ्याकडे चार चाकी गाडी आहे.

म्हणून मला सर्वजण हा 'मोठा' माणूस आहे,याला काय कमी आहे,असं म्हणतात.हो माझ्याकडे मोठी गाडी आहे.

पण मी फक्त महिन्याला २०० किलोमीटर प्रवास करू शकतो.त्याच्यावर एक किलोमीटर सुद्धा नाही.

'ना'ईलाजाची चौकट आहे.मनात फार असणं आणि ते प्रत्यक्षात होणं यात खूप अंतर असतं.जर मला एखाद्या महिन्यात जास्त किलोमीटर प्रवास करायचा असेल तर मी अगोदरच्या महिन्यात कमी प्रवास करून ते पेट्रोल वाचवतो.व ते शिल्लक राहिलेले पेट्रोल पुढच्या महिन्यातील जास्तीच्या प्रवासासाठी वापरतो.पण तरीही मी मनमौजी आयुष्य जगतो.कमी पण जास्तीच ते व्यक्तीत्व मला खूपच आशावादी आणि आनंदी वाटले. नाईलाजाची चौकट असून सुद्धा आनंदी व समृद्धी आयुष्य जगता येतं हे मी शिकत होतो.


व्हाट्सअपचा आपण विचार न करता करत असणारा वापर आलेला कोणताही लेख अथवा संदेश न वाचता न समजून घेता फक्त पाठवण्याची स्पर्धा लागलेल्या स्पर्धेतील आपण एक स्पर्धक आहोत हेही आपल्याला कळेना झालं आहे.एका महत्वपूर्ण गंभीर असणाऱ्या संदेशामध्ये आपण इमोजी चा वापर करतो. जास्तीत जास्त इमोजी चा वापर करावाच असा काही लिखित नियम नाही.या इमोजी मुळे काय होतं,कळत न कळत आपल्याकडून चुकीची इमोजी त्या ठिकाणी टाकली जाते.

त्यामुळे त्या संदेशातील महत्त्वाचा गाभा व गर्भित अर्थ नष्ट होतो आणि त्याचं रूपांतर एका विनोदात होतं हे आपल्या गावीही नसतं. किती सरळ साधं तत्वज्ञान आहे की माणसांनी कसं काटेकोरपणे जगायला हवं.हे सर्व मी मन लावून श्रवण करत होतो.एक पुस्तक स्वतःहून मला पुस्तक समजावून सांगत आहे असं वाटत होतं.हे सांगत असताना त्यांनी एक घडलेला जिवंत प्रसंग सांगितला आणि माझ्या अंगावर सरर्कन काटा आला.तर तो घडलेला प्रसंग असा होता.जो त्यांना त्यांच्या कोल्हापुरातील काही मित्रांनी सांगितलेला होता.


एक हरीण आपल्या पाडसासोबत खेळत होतं त्यांच खेळणं म्हणजे निसर्ग समजून घेणं,जीवन जगताना कोणते नियम पाळणं याचं ज्ञान घेणं.खेळता खेळता हे पिल्ल एका कड्यावरून दहा-पंधरा फुट खाली पडलं,

तिथून काही अंतरावरच वाहनांची वर्दळ होती.त्यामुळे त्या आईला काहीच करता येत नव्हतं त्यामुळे आपल्या जीवाचं काहीतरी बर वाईट होईल.एखादं वाहन आपल्याला धडकेल यामुळे ती आई थोड्या दूर अंतरावर एका झाडाजवळ उभी होती,व कोणी तरी मदत करेल या आशेने डोळ्यात प्राण आणून ती वाट पाहत होती.बराच वेळ निघून गेला आणि संवेदनशील असणाऱ्या एका माणसाला ही आई दिसली.आणि त्याने गाडीतून उतरून आसपास बघितले.आणि त्याला हरीण का थांबले आहे?याचे उत्तर मिळालं तिच पिल्लू काही अंतरावर सुरक्षित होतं.थोडसं खरचटलं होतं.त्याला वर काढण्यासाठी दोरीची आवश्यकता होती पण त्याच्याजवळ दोरी नव्हती.त्याने मनापासून मदत करायचे ठरवल्यामुळे,त्याने मदतीसाठी हात केला आणि दोरी गाडीत असणाऱ्या एका दुसऱ्या गाडीवाल्याने गाडी थांबवली आणि त्या दोघांनी मिळून दोरी टाकून त्या पाडसाला वरती काढलं. हे सर्व ती हरीण आई पाहत होती.पिल्लाला वर काढल्यानंतर ते हरिण जवळ आले तिने पिल्लाकडे बघितलं त्या पिल्लानं आणि त्या हरिण असणाऱ्या आईने त्या दोघा उपकार करत्या लोकांच्या पायावरती डोकं ठेवून त्यांचे मनापासून आभार मानले.त्याचं ते हे अलौकिक कृत्य पाहून त्या दोघा लोकांच्या डोळ्यातही अश्रू आले.एका गाडीत त्या दोघांना घेऊन काही किलोमीटर अंतरावर असणाऱ्या एका घरवजा दवाखाना असणाऱ्या घरात त्या पाडसाच्या जखमेवरती औषध उपचार करून त्या दोघांना परत त्यांच्या मुळ ठिकाणी आणून सोडलं.ही घटना घडून बरेच दिवस झाले.काही कालावधी निघून गेल्यानंतर विसरण्याच्या सवयी नुसार ही घटना त्या उपचार करणाऱ्या माणसाकडून विसरली गेली.पण दुसऱ्या बाजूला ही घटना विसरली गेली नव्हती.बऱ्याच दिवसानंतर सकाळी त्या माणसाच्या दारावरती टकटक झाली.ती झालेली टकटक ही विचार करायला लावणारी होती.त्या व्यक्तीने दरवाजा उघडला आणि समोर पाहतो तर काय त्या माणसाचा विश्वास बसेना कारण त्याच्या अंगणामध्ये दहा ते पंधरा हरणांचा कळप उभा होता आणि त्या कळपाच्या पुढे खरचटलं म्हणून उपचार केलेले पाडस आणि त्याची आई होती. जणू काही ती सर्व सांगत होती की तुम्ही आमच्यावर जी दया दाखवली,आमच्यावर प्रेम केलं.व आमच्यावर वेळीच उपचार केले त्याबद्दल आम्ही आमच्या संपूर्ण कळपाच्या वतीने आपले व आपल्या माणुसकीचे आभार व धन्यवाद द्यायला एकत्रित आलेलो आहोत.हे पाहून त्या व्यक्तीच्या डोळ्यातील अश्रू अखंडपणे वाहत होते.गोष्ट अजून संपलेले नाही.थोडं थांबा दोन मिनिटे डोळे बंद करा.आणि वर घडलेली घटना बंद डोळ्यासमोर पहा,तुम्हाला जो अनुभव येईल जी संवेदना येईल ती संवेदना,तो अनुभव म्हणजेच जगणं असतं.सर्वच माणसांनी जर ठरवून थोडं थोडं चांगलं वागलं तर एक दिवस संपूर्ण मानव जात चांगली बनेल.

युव्हाल नोआ हरारी यांनी सेपियन्स या पुस्तकात नोंद केली आहे.ती पुढीलप्रमाणे विज्ञानाच्या इतिवृत्तामध्ये सगळ्यांत प्राणघातक जात जर कोणती असेल तर ती आहे 'माणूस' ही नोंद त्या हरणांनी वाचलेली नाही.पण त्या हरणांच्या मदतीने आपण ती नोंद हळूहळू पुसू शकतो.निसर्ग,प्राणी पक्षी यांच्यासोबत जर आपण जात राहिलो. यांना जर समजून घेत गेलो.त्यांच्या संवेदना समजून त्यांना जर आपण दयाळूपणे वागवले.तर

कधीतरी भविष्यातील एखाद्या पुस्तकांमध्ये एक नोंद असेल ती पुढील प्रमाणे विज्ञानाच्या इतिवृत्तामध्ये सगळ्यात प्रेमळ जात कोणती असेल तर ती 'माणूस' यासाठी या क्षणापासून आपल्याला चांगला माणूस म्हणून जगायचं आहे.आता प्रश्न असा पडतो की खरचटलेलं पाडस आणि त्याच्यासोबत गेलेली आई ही गाडीतून गेले होते.मग तो हरणाचा कळप अचूकपणे कसा काय त्या उपचार करणाऱ्या उपकार करत्या माणसाच्या घरासमोर गेला.चमत्कार निसर्गाच्या विरुद्ध नसतात,पण आपल्याला निसर्गाबद्दलच्या माहितीपेक्षा वेगळे असतात.- सेंट ऑगस्टाइन ( ३५४ - ४३०) धर्मशास्त्र अभ्यासक आणि कॅथोलिक बिशप धर्मोपदेशक यांनी म्हटलेलं आहे.त्यांनी सांगितलेली गोष्ट संपली.

आणि इथूनच पुढे सुरू झाला माझा विचार करण्याचा प्रवास सुरू..! 'शिवप्रसाद कात्रे' हे त्या दिवशी आपल्या ८६ वर्षाच्या मित्राला भेटायला पेठवडगावंला गेले होते.

येताना मला भेटले यांच्या भेटीमुळे जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन आणखी निकोप झाला.त्यांचे आभार व धन्यवाद…! शेवटी निसर्गामध्ये झाडाच्या फांदी वरती आपल्या घरट्यात पक्षी जे गाणं गातो.ते गाणं आनंदाचं गाणं असतं,तर दुसरीकडे सिमेंटच्या घरामध्ये पिंजऱ्यात असणारा पक्षी जे गाणं गातो ते गाणं असतं 'ना'ईलाजाचं..हिप्पोक्रेट्स यांनी फार अगोदरच सांगितले आहे."दोन गोष्टींची सवय लावा,

मदत करण्याची किंवा किमान,कोणतीही हानी न करण्याची…!" 


मला 'मॅट्रिक फेल' विजय पुस्तकांच्या विश्वात' या लेखापर्यंत घेवून जाण्यासाठी प्रयत्न करणारे डॉ.दिपक शेटे,माझी धर्मपत्नी सौ.मेघा गायकवाड,त्याचबरोबर माधव गव्हाणे (सॉक्रेटिस) यांचे आभार व धन्यवाद.