* विजय गायकवाड | Vijay Gaikawad

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

२६/१२/२४

रहस्य आणि गोष्टी / Mysteries and things

त्यातून दोन ट्यूबस् मागच्या बाजूला जातात.दोन्ही हातांनी तो कोणत्या तरी वाहनावर नियंत्रण ठेवत आहे असा भास होतो.

डाव्या हाताचा पंजा क्लच,ॲक्सिलेटर, पेडल वगैरे सारख्या कुठल्या तरी भागावर ठेवलेला आहे;वर असणाऱ्या हाताची बोटे पाहिली की वाटते की तो रेडिओच्या बटणासारखे काही तरी फिरवत आहे. मोटारसायकल वापरताना पेट्रोलचा कमी-जास्त पुरवठा करण्यासाठी हाताने थ्रॉटल ओढावे,अशाच प्रकारे त्याची दुसऱ्या हाताची बोटे वळलेली आहेत.त्याचा पोषाख तसा अगदी आधुनिक पद्धतीचा आहे. अंगालगत घट्ट बसणारा फुलस्लीव्हज्चा पुलओव्हर, पुलओव्हरच्या ओव्हरच्या लांब हातांची मनगटावर घडी, अर्धी पॅन्ट,तिला रूंद कमरपट्टा,पायात मोजे,सर्वच अगदी घट्ट,अंगाला बसेल असे;अगदी आजच्या विसाव्या शतकातील अंतराळवीरच जसा काही! त्याची बसण्याची ढब सुद्धा आजच्या अंतराळवीरांसारखी आहे.आपण पाहत आहोत तो प्राचीन काळातील अंतराळावीरच असणार याबद्दल कोणाच्याही मनात शंका येऊ नये.तो दुसरा कोणी असूच शकणार नाही.(हा फोटो मुळ पुसतकात पहायला मिळेल.)


तांत्रिक भाषेतच बोलायचे तर त्याच्या चेहऱ्यासमोर ऑक्सिजनचे उपकरण आहे.कम्युनिकेशन सिस्टिम्स् आणि ऊर्जा मर्यादित करणारी यंत्रेही समोरच आहेत. सर्व यंत्रांवर हाता-पायांनी नियंत्रण ठेवण्यात येत आहे. अंतराळयानातून बाहेरच्या बाजूला बघण्याचीही सोय आहे.या सर्व यंत्रांच्या पुढे दोन लोहचुंबक असावेत. अंतराळयानाभोवती चुंबकीय क्षेत्र निर्माण करून अंतराळात अफाट वेगाने प्रवास करताना काही आदळू नये म्हणून!अंतराळवीरांच्या मागे ऊर्जा निर्माण करणारी अणुभट्टी असावी आणि चित्राच्या बाहेर रॉकेटचा एक्झॉस्ट दाखवला आहे.


हे शिलाचित्र खरेच आपल्याला काहीच दर्शवत नाही? निश्चितपणे माया लोकांना त्यांच्या अंतराळ पाहुण्यांची माहिती इतरांना द्यायची होती आणि त्यांना माहीत असलेल्या एकाच पद्धतीने त्यांनी ती दिली.शिलाचित्र कोरून! पण त्या कारागिरांना त्या चित्रातील ज्ञानाची माहिती असणे अशक्य आहे.मग या तांत्रिक बाबी त्यांनी कशा कोरल्या असतील? नुसते बघून हे अंतराळयान लक्षात राहणे कठीणच!मग त्यांनी अंतराळवीरांचाच सल्ला घेतला असेल का?आणि सोप्या पद्धतीने काढता येईल असे चित्र त्यांनी माया लोकांना दिले असेल का? यात काही अशक्य नाही.या सर्व देवांनी त्यांच्या पृथ्वीला दिलेल्या भेटी गुप्त राहाव्यात असा प्रयत्न कधीच केलेला नाही.त्यांनी त्यांचे ज्ञान पुढील पिढ्यांना देण्यासाठी जतन करून ठेवा असे सांगून नेहमीच उघड केले आहे.त्यांनी दिलेल्या पृथ्वी भेटीचा वृत्तांत आपल्यापर्यंत पोहोचावा या हेतूनेच त्यांनी ते केले असेल यात अशक्य काय आहे? की पुन्हा प्रत्येक गोष्टीचा संबंध अंतराळ प्रवासाशी लावण्यात येतो असे म्हणणार? प्राचीन काळातील अंतराळ प्रवासाच्या सिद्धान्ताला देत असलेल्या पुराव्यातून हे शिलाचित्र जर वगळले जाणार असेल तर अशा अलौकिक पौराणिक वस्तूंवर संशोधन करणाऱ्या विद्वानांच्या दानतीबद्दलच शंका घ्यावी लागेल.


मायांनी आपली शहरेसुद्धा नद्यांच्या काठी,समुद्राच्या काठी न बांधता जंगलात का बांधली ? त्यांना समुद्र माहीत नव्हता असा भाग नाही.समुद्रात किंवा समुद्रकिनाऱ्यावर मिळणाऱ्या गोष्टींपासून त्यांनी बनवलेल्या शेकडो गोष्टी सापडल्या आहेत.पण जंगलात राहून मग तिथे पाणी पुरवठ्यासाठी प्रचंड टाक्या बांधण्याचा खटाटोप त्यांनी कशासाठी केला? ग्वाटेमालातील टिकल येथे अशा तेरा टाक्या आहेत की ज्यात एक लाख चौरस मीटर एवढे पाणी मावेल.


त्यांनी चिचेन येथे बांधलेली वेधशाळा त्यांची अगदी पहिली आणि सर्वात जुनी गोलाकार इमारत आहे.या तीन मजली इमारतीला आतून गोल गोल जिना आहे. बाहरेच्या भिंतीवर पर्जन्य देवाची आणि उडणाऱ्या मानवांची चित्रे आहेत.


मायांना युरेनस आणि नेपच्यून या ग्रहांचीसुद्धा कशी माहिती होती? पालेन्क येथील पिरॅमिडमधला, अग्निबाणात बसलेला अंतराळवीर आपल्याला काय सुचवतो?मायांच्या कॅलेन्डरमध्ये चार कोटी वर्षांची गणिते का करून ठेवली आहेत?व्हेनुशियन सिद्धान्त शोधून काढण्याइतके ज्ञान त्यांनी कसे मिळवले? खगोलशास्त्राच्या इतक्या अफाट ज्ञानाची प्राप्ती त्यांना झाली तरी कुणाकडून ?


मायांच्या सर्व इमारतींवर सर्पाचे चिन्ह का? जंगलात शहरे वसवणाऱ्या मायांनी एखादे फूल आपले चिन्ह म्हणून का निवडले नाही?किंवा एखादा जंगलातला प्राणीच ? तिरस्करणीय सर्पाचे चिन्हच आपल्याला मायांच्या साम्राज्यात पावलोपावली का आढळते? आणि अशा या सर्पाला पुन्हा उडण्याची शक्ती त्यांनी का सूचित करावी? त्याचा देव म्हणून का स्वीकार करावा?


आधीच होत असलेला बौद्धिक गोंधळ पूर्ण करण्यासाठी प्राचीन काळातल्या आणखी काही चमत्कारिक गोष्टींकडे नजर टाकायला हरकत नाही.


१९०० साली ग्रीक पाणबुड्यांनी एक बुडालेले जहाज शोधून काढले.त्यातून संगमरवरी आणि ब्रॉन्झच्या अनेक कलाकृती त्यांनी वर काढल्या.नंतरच्या संशोधनात हे जहाज जवळ जवळ २००० वर्षांपूर्वी बुडाले होते असे कळले.जहाजातून वर काढलेल्या अनेक गोष्टींमध्ये एक कसला तरी गोळाही दिसत होता;धड कुठला आकार नसलेला,रूप नसलेला हा गोळाच आपल्या दृष्टीने सर्वांत महत्त्वाचा ठरला.संशोधकांनी हळुहळू काळजीपूर्वक त्याच्यावरची घाण काढून टाकली व साफ केला तेव्हा तो ब्रॉन्झचा एक पत्रा होता असे लक्षात आले.त्याच्यावर निरनिराळ्या वर्तुळाकृती चकत्याही दिसत होत्या.एकेक भाग साफ केल्यावर त्या पत्र्यावर अनेक गोष्टीही लिहिलेल्या आढळल्या.सर्वांचा संबंध खगोलशास्त्राशी होता.शेवटी लक्षात आले की ते एक यंत्र होते. त्याच्यावर एकमेकात अडकणाऱ्या अनेक वर्तुळाकृती चकत्या,

डायल्स,पट्ट्या वगैरे काय काय होते.एका बाजूचे चाक फिरवले की या सर्व चकत्या वेगवेगळ्या वेगाने फिरायला लागत. काट्यांना ब्रॉन्झची संरक्षक आवरणे होती.त्यांच्यावरही अनेक गोष्टी लिहिलेल्या होत्या.आज हे यंत्र कोणत्या तरी कुशल यंत्रज्ञ कामगारांनी बनवले आहे याबद्दल कुणालाच शंका नाही.अमेरिकन प्रोफेसर सोला प्राईस यांनी ते एक गणकयंत्र आहे आणि त्याच्या मदतीने सूर्य,चन्द्र, तारे यांच्या भ्रमणकक्षा शोधून काढता येतील असे सिद्ध केले आहे.नक्षत्रदर्शन घडवणारे छोटे तारांगणच !


हे यंत्र २१०० वर्षांपूर्वी बनवलेले आहे हे महत्त्वाचे नाही. अशा तन्हेने बनविलेले हे पहिले यंत्र नसणारच.कुतूहल एकाच गोष्टीचे असे पहिले यंत्र कोणी,कधी व कसे बनवले असेल?


१३ व्या शतकाच्या सुरुवातीला धर्मयुद्धावरून परत येताना सम्राट फ्रेड्रिक याने एक आगळाच तंबू परत आणला होता.तंबू उघडला की त्याचे छत घुमटासारखे दिसत असे.तंबूत एक छोटे यंत्रही होते.हे सुरू केले की या घुमटात नक्षत्रे त्यांच्या जागांवरून भ्रमण करायला लागत.हा सुद्धा एक छोटा प्लॅनेटोरियमच ! पण त्या काळात तो बनविण्याइतके तंत्रज्ञान तरी उपलब्ध होते; पण दोन हजार वर्षांहूनही जुने जे यंत्र ग्रीक पाणबुड्यांनी शोधून काढले आहे त्याचे काय? त्या काळात स्थिर तारे,नक्षत्रे,पृथ्वीचे भ्रमण या सर्व गोष्टी लक्षात घेणारे कोण होते? चिनी आणि अरबी खगोलशास्त्रज्ञसुद्धा याबाबतीत विशेष काही सांगू शकत नाहीत.

गॅलिलिओ गॅलिली जन्माला यायला अजून १५०० वर्षे हाती.फेड्रिकच्या तंबूबद्दल अनेक ठिकाणी वाचायला मिळते पण ग्रीक पाणबुड्यांनी शोधून काढलेले यंत्र अथेन्सच्या म्युझियममध्ये जाऊन कोणीही पाहू शकतो.


प्राचीन काळाने आपल्यासाठी सोडलेली ही आणखी काही कोडी !


दहा हजार वर्षांपूर्वी दक्षिण अमेरिकेत ज्यांचे अस्तित्वच नव्हते अशा सिंह आणि उंट या प्राण्यांची चित्रे दक्षिण अमेरिकेतच समुद्रसपाटीपासून १२५०० फूट उंचीवर असलेल्या पठारांवरील खडकांवर कोरलेली आढळतात.


तुर्कस्तानमध्ये काचेच्या किंवा मातीच्या अर्धवर्तुळाकृती वस्तू सापडतात.त्या काय आहेत ते अजून कळत नाही.


अमेरिकेत नेवाडा वाळवंटात 'डेथ व्हॅली'मध्ये कोणत्या तरी प्रचंड उत्पाताने नष्ट झालेल्या शहरांचे अवशेष सापडतात.आजही वितळलेले खडक आणि वितळलेली वाळू तिथे दिसते.अगदी ज्वालामुखीचा उद्रेक झाला तरी,खडक वितळण्याइतकी उष्णता निर्माण होऊ शकत नाही.अशी उष्णता कोणत्याही कारणाने निर्माण झाली असती तर त्या शहरातल्या इमारतींवर परिणाम झालेला दिसला असता.तसा तो आढळत नाही.आज खडक वितळवण्याइतकी उष्णता निर्माण करणारी एकच गोष्ट आपल्याला माहिती आहे.ती म्हणजे लेसर किरण !


लेबॅनॉनमध्ये दोन लक्ष पौंड वजनाचा,ठराविक आकारात कापून गुळगुळीत केलेला दगड आहे.हा तरी कोणत्या मानवी हातांनी हलविलेला असणे शक्य नाही.


ऑस्ट्रेलिया,फ्रान्स,लेबॅनॉन,चिली,दक्षिण आफ्रिका, भारत इत्यादी देशात ॲल्युमिनियम,बेरिलियम असणारे विचित्र काळे दगड सापडले आहेत.अगदी अलीकडे केलेल्या संशोधनात आढळून आले आहे की,प्राचीन काळात भयंकर उष्णता आणि किरणोत्सर्गाचा वर्षाव या दगडांवर झाला असला पाहिजे.प्राचीन काळात किरणोत्सर्ग ?


ब्रिटिश म्युझियममध्ये भूतकाळातील आणि भविष्यकाळातील चन्द्रग्रहणांची माहिती वाचायला मिळते.पण ती लिहिली आहे बाबिलोनियन मृत्तिकापत्रांवर !


चीनमध्ये युनान प्रांतात झालेल्या एका भीषण धरणीकंपात कुनमिंग या सरोवरातून एक प्राचीन पिरॅमिडच वर आला.या पिरॅमिडवर अंतराळात झेप घेणाऱ्या अग्निबाणांची चित्रे कोरून काढलेली आहेत. पृथ्वीच्या पोटात आणखी किती रहस्ये,कुठे कुठे दडून राहिली आहेत हे कोण सांगणार?


 या सर्व गूढ गोष्टींचा उलगडा कोण करील आपल्यासाठी? प्रत्येक जुनी आख्यायिका,दंतकथा, पुराणकथा खोटी आहे,चुकीची आहे अशी त्यांची वासलात लावणे म्हणजे मूळ मुद्दे डावलण्यासारखे आहे.कसली भीती वाटते या लोकांना की नवीन सत्य समोर दिसले की हे डोळे झाकून घेतात आणि दुसरा कोणी नवीन सिद्धान्त मांडायचा प्रयत्न केला तर यांच्या कानांना जसे काही दडेच बसतात आणि त्यांना ऐकू येत नाही?


आज तर जगात अशी परिस्थिती आहे की दर दिवशी काही तरी नवीन घडत आहे,नवीन गोष्टी उघडकीला येत आहेत,नव्या गोष्टींचा शोध लागत आहे.आजच्या दळणवळणाच्या,वाहतुकीच्या,संदेश पाठवण्याच्या सोयींमुळे या गोष्टी तात्काळ जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचत आहेत.ज्या उत्साहाने नवीन गोष्टींच्या शोधांकडे आपण बघतो,त्याच उत्साहाने भूतकाळातील गोष्टींकडेही आपण बघायला पाहिजे.आपल्या भूतकाळाच्या शोधाचा पहिला टप्पा संपत आला आहे. आता मानवी इतिहासाच्या नवीन साहसी पर्वाला सुरुवात होत आहे.


अंतराळ प्रवासाच्या !


२४.१२.२४ या लेखातील पुढील शेवटचा भाग...

२४/१२/२४

रहस्य आणि गोष्टी / Mysteries and things

गेल्या दोन हजार वर्षांच्या इतिहासाबद्दल तसा प्रश्न नाही.तो आपल्याला व्यवस्थित माहिती आहे तरी सुद्धा रोमन,ग्रीक यांच्या देवदेवतांवर इतर महाकाव्ये, दंतकथा,आख्यायिकांवर आपल्या प्राचीन भूतकाळाची छाया पडल्यासारखी वाटते.अगदी अलिकडच्या अशा संस्कृतींचा विचार केला तरी त्यांच्या आख्यायिका आपली नजर प्राचीन भूतकाळाकडेच वळवतात.


दक्षिण अमेरिकेतील ग्वाटेमाला आणि मेक्सिकोतील जंगलात दडलेल्या मायांच्या प्राचीन अवशेषांची तुलना फक्त इजिप्त

मधल्या प्रचंड बांधकामांशीच होऊ शकते.मेक्सिकोच्या राजधानीच्या दक्षिणेस ६० मैलांवरील चोलुला येथील पिरॅमिडचे क्षेत्रफळ खुफूच्या पिरॅमिडहून जास्त आहे.तर उत्तरेकडील ३० मैलांवर असलेल्या टिओटिहुआन्का येथील पिरॅमिड ८ चौरस मैल जागा व्यापतो.


मायांची आख्यायिका सांगते की १०,००० वर्षांपूर्वी एक अत्यंत पुढारलेली अशी संस्कृती नांदत होती.माया लोक

आले कुठून हे आपल्याला कळलेले नाही अणि कुठे गेले तेही माहीत नाही.म्हणूनच त्यांनी दिलेली माहिती महत्त्वाची आहे.


मेक्सिकोतील युकातान भागात उतरल्यावर बिशप डीयागो डी लांडा यानेसुद्धा मायांच्या कित्येक हस्तलिखितांची होळी केली आणि वर प्रौढी मारली की त्या भारुडात विशेष काही नसल्याने तेथील सर्व लोकांचा विरोध मोडून काढून आम्ही सर्व गोष्टींचा नाश केला म्हणून!या विध्वंसातून मायांची फक्त तीन हस्तलिखिते वाचली आहेत आणि आज ज्या ठिकाणी ती ठेवलेली आहेत त्याच नावाने ती ओळखली जातात.


माद्रिद कोडेक्समध्ये ११२ रंगविलेल्या चित्रांची पाने आहेत.त्या चित्रांवरून काय अर्थ काढायचा हे प्रत्येकाने ठरवावे अशी परिस्थिती आहे.


ड्रेस्डेन कोडेक्सची ७४ पाने शिल्लक आहेत. खगोलशास्त्राची गणिते आणि चंद्र,शुक्र यांच्या भ्रमणाबद्दलची माहिती त्यात आहे.


मूळच्या पॅरिस कोडेक्सची तर फक्त दोनच पाने शिल्लक आहेत.मिळाली तेव्हाही बावीसच होती पण उरलेल्यांच्या प्रती तरी गेल्या शतकाच्या शेवटी काढल्या गेल्या होत्या हे नशिबच.या कोडेक्समध्ये कॅलेन्डरवर आधारित भविष्ये वर्तविली आहेत.


मायांच्या लिखाणाचा अर्थ लागत नाही याचे कारण म्हणजे वेगवेगळ्या खुणा आणि आकृत्या यांची त्यात असलेली रेलचेल.त्याच खुणा आणि तीच चिन्हे वेगवेगळ्या तऱ्हांनी वापरली की अर्थ वेगळा होतो.


मायांचे कॅलेन्डर आणि त्यांचा व्हेनुशियन फॉर्म्युला यांचा उल्लेख पूर्वीच केला आहे.मेक्सिकोतील पालेन्क, चिचेन इट्झा,ग्वाटेमालातील टिकल,होंडुरासमधील कोपान या सर्व ठिकाणची बांधकामे मायांच्या कॅलेन्डरला धरूनच झाली आहेत हे आज सिद्ध झाले आहे.त्यांना गरज होती म्हणून काही त्यांनी देवालये, पिरॅमिड बांधले नाहीत.त्यांनी पिरॅमिड आणि देवालये बांधली कारण त्यांच्या कॅलेन्डरची आज्ञा होती की इमारतीच्या इतक्या इतक्या पायऱ्या अमुक दिवसात बांधल्या पाहिजेत,

प्लॅटफॉर्म इतक्या महिन्यांनी आणि मंदिर इतक्या वर्षांत ! मायांच्या प्रत्येक इमारतीच्या दगड न् दगडाचा संबंध त्यांच्या कॅलेन्डरशी आहे.पूर्ण झालेली प्रत्येक वास्तू कॅलेन्डरप्रमाणे बांधलेली आहे.


पण मग काही तरी अघटित प्रकार घडला आणि तसे काहीच कारण दिसत नसताना त्यांची हजारो वर्षे टिकतील अशी बांधकामे,भव्य शहरे,सधन मंदिरे,पिरॅमिड यांचा मायांनी संपूर्ण त्याग केला आणि माया लोक निघून गेले.परत कधीही न येण्याकरता!त्यांची अप्रतिम शहरे बघता बघता फोफावणाऱ्या जंगलांनी व्यापून टाकली.


माया लोक का निघून गेले? याबाबत अनेक मते व्यक्त झाली आहेत.त्यांच्यावर परचक्र आले असेल असे म्हणावे तर माया त्यावेळी त्यांच्या प्रगत आणि संपन्न अशा संस्कृतीच्या अगदी अत्युच्च शिखरावर होते. त्यांच्यावर चढाई करण्याची आणि त्यांचा पराभव करण्याची ताकद त्यावेळी कुणातच नव्हती.


की हवामानात जबरदस्त फरक झाल्यामुळे मायांना देशत्याग करणे भाग पडले? पण या विचारालाही अर्थ दिसत नाही.मायांचे जुने राज्य आणि नवे राज्य यात २२५ मैलांचेसुद्धा अंतर नाही.हवामानातल्या फरकामुळे देशांतर करावे लागले असते तर माया लोकांना हजारो मैलांवर कुठल्या कुठे जावे लागले असते.


की भयानक अशा कुठल्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे सर्व पळापळ झाली?यालाही दुजोरा मिळण्यासारखे काही दिसत नाही.


की मायांमध्ये यादवी युद्ध माजले?नवीन विचारांचे तरूण आणि कर्मठ मतांची जुनी पिढी यांच्यात संघर्ष निर्माण झाला का? पण ही शक्यता विचारात घेतली तर सर्वच मायांना देशत्याग करण्याची आवश्यकता नव्हती. पराभूत मायाच देशोधडीला लागले असते.विजयी माया आपले पाय रोवूनच त्या साम्राज्यात राहिले असते.पण पुराणवस्तू संशोधकांना माया जमातीतील एक माणूस सुद्धा मागे शिल्लक राहिला होता याचा पुरावा सापडत नाही.बुद्धिमान,गणितज्ञ,

खगोलशास्त्रात पारंगत सर्वच्या सर्व माया जमात आपली शहरे,आपली पवित्र स्थाने,आपली देवळे,पिरॅमिड यांचा त्याग करून नाहीशी झाली.


आजपर्यंत अनेक बाजूंनी विचार करून ज्या प्रश्नाचे उत्तर मिळत नाही त्याबाबत आणखी एक शक्यता विचारात घेण्यासारखी आहे.तिलाही तसा पुरावा नाहीच.इतर स्पष्टीकरणाची शक्यता गृहीत धरूनसुद्धा एक नवीन विचार मांडायला हरकत नाही.


मायांच्या पूर्वजांना देवांनी (म्हणजे अंतराळवीरांनी) भेट दिली असावी.खगोलशास्त्र,गणित,कॅलेन्डर या सर्वांबाबात माया धर्मगुरू अत्यंत गुप्तता बाळगून होते.हे सर्व ज्ञान परिश्रमाने गुप्त ठेवून जतन करण्यात येत होते;कारण देवांनी मायांना वचन दिले होते की अमूक अमूक वर्षांनी ते परत येतील म्हणून!


देवांनी धर्मगुरुंना दिलेल्या आज्ञांप्रमाणे कॅलेन्डरमध्ये दिलेल्या स्पष्ट सूचनांप्रमाणे मायांनी त्यांची भव्य बांधकामे करायला सुरुवात केली.ठराविक वर्षांत ही सर्व भव्य मंदिरे,पिरॅमिड बांधल्यावर देव परत येणार होते.देव परत येण्याचे वर्ष माया लोकांच्या दृष्टीने आनंदोत्सवाचे वर्षच होते.त्यावर्षी देव परत येणार होते, त्यांनी बांधलेल्या अप्रतिम आणि भव्य मंदिरांचा, पिरॅमिडस्चा स्वीकार करणार होते आणि नंतर कायमचे त्यांच्यात राहणार होते.


दक्षिण अमेरिकेतील रहस्ये आणि इतर काही गोष्टी,देव ? छे ! परग्रहावरील अंतराळवीर ! बाळ भागवत,मेहता पब्लिशिंग हाऊस


मायांनी ते वर्ष जवळ येत असताना उत्साहाने सर्व भव्य इमारती पुऱ्या करीत आणल्या.देव परत येण्याच्या वर्षी त्यांच्या स्वागताची पूर्ण तयारी झाली होती.मंदिरे बांधून झाली होती,पिरॅमिडस् तयार झाले होते,इतर भव्य वास्तू पूर्णपणे बांधून तयार होत्या.माया लोक उत्साहाने प्रार्थना करीत होते.देवांच्या स्वागताची स्वागतगीते पाठ करीत होते.आकाशातून देवांचा दैदिप्यमान रथ कधी उतरतो याकडे नजर लावून होते.वर्षाचे दिवस सरायला लागले.मायांच्या मनात चलबिचल निर्माण व्हायला लागली.देवांना धूप,दागदागिने,

धान्य यांचे नजराणे, गुलामांचे बळी द्यायला सुरुवात झाली.पण अंतराळात संपूर्ण शांतता होती.गंभीर,मेघगर्जनेसारखा आवाज करीत येणारा देवांचा दैदिप्यमान रथ नजरेस पडत नव्हता.वर्ष संपले तरी देव आलेच नाहीत.


धर्मगुरू आणि सर्वच माया लोकांना निराशेचा किती जबरदस्त धक्का पोहोचला असेल याची कल्पना करवत नाही ! शतकानुशतके देव परत येणाऱ्या दिवसाची वाट पाहत उत्साहाने केलेली भव्य बांधकामे मातीमोल ठरत होती.माया लोकांच्या मनात किती तरी संशय निर्माण झाले असतील.कॅलेन्डर बनवण्यात काही चूक झाली का? की देव चुकून भलतीकडेच उतरले होते?की आणखी काही भयानक घोटाळा झाला होता?त्यांनी पुनःपुन्हा सर्व गणिते करून बघितली असतील.काहीच चूक नव्हती.सर्वांचा अर्थ एकच होता.देवांनी वचन देऊन ते मोडले होते.त्यांनी माया लोकांची घोर फसवणूक केली होती.सर्व गोष्टींवरचा विश्वास उडून दारूण निराशेच्या धक्क्यानेच मायांनी सर्व गोष्टींचा त्याग केला होता असेच म्हणावे लागते.


१९३५ मध्ये मेक्सिकोतील पालेन्क येथील मायांच्या पिरॅमिडमध्ये अगदी वरच्या बाजूने खाली खाली जाणाऱ्या पायऱ्या सापडल्या.

जमिनीखाली सहा फुटापर्यंत पोहोचलेल्या.अगदी सापडू नयेत. अशा उद्देशानेच बांधल्यासारख्या वाटत होत्या.खालची खोली १४ फूट लांब आणि ७ फूट रूंद अशा दगडी शिळेने बंद केली आहे.चारही कडांना मायांची चित्रलिपी,की जिचा अर्थ आपण आजपर्यंत लावू शकलेलो नाही.या शिलेवरील अप्रतिम अशा कोरीव कामाकडे समोरून,बाजूने कशीही नजर टाकली तरी अंतराळयानात बसलेला अंतराळवीरच आपण पाहात आहोत ही भावना काही मनातून जात नाही.मोटारसायकलची रेस असली तर मोटारसायकलवरचा स्पर्धक पुढे वाकून बसेल त्याच थाटात त्या चित्रातील माणूस वाकून बसला आहे.त्याच्या डोक्यावर शिरस्त्राण आहे.


या भागातील शिल्लक राहिलेला भाग पुढील लेखामध्ये..!

२२/१२/२४

देव तेथेची जाणावा / May God be there

सकाळची आवराआवर करून पाटलांच्या श्रीपतीतात्यांनी शेताची वाट धरली.कारखान्याला ऊस जाऊन महिना झाला होता.औंदा खोडवं काढून भात पेरायचं ठरलेलं.आलटून-पालटून पीक घेतलं,तर मातीचा कस राहील,नाही तर पैशाच्या नादात नुसतंच ऊस पिकवत बसलं तर रानाला मीठ फुटायचं.शिवाय पोटापुरतं भात आणि ज्वारी पाहिजेच की! नुसती चिपाडं चघळून पोटं भरायची नाहीत,असा विचार करून श्रीपतीतात्यांनी ऊस तुटून गेल्यावर पाला पेटवून रान नांगरून ठेवलं होतं.त्यानंतर महिनाभर रान तसंच ठेवल्यामुळं ढेकळं चांगलीच तापलेली.

त्यातच दोन दिवसांपूर्वी पावसाचं सरवाट येऊन गेलं.तापलेल्या रानावर पावसाच्या सरी बरसल्यामुळं रानात कुळवायला चांगलीच घात आलेली.


बाहेरगावी शिकायला असलेला पोरगापण सुट्टी असल्यामुळं काल संध्याकाळी आला होता.आज तो हाताखाली आहे तोवर रान कुळवून पुरं करायचं. कारभारीन न्ह्यारी घेऊन आली की दुपारच्या म्होरं कस्पाटं येचून दिंडं फिरवलं की रान पेरायला तयार. रोजगारी माणसांकडून शेती करून घेणं गरीब शेतकऱ्याला कुठलं परवडतंय?घरातल्यांनी राबायचं म्हणजे हाताला काम झालं की खाल्लेल्या अन्नाचं रक्त होतंय,नाही तर पोटावर चरबी साठती,पाटील आपल्या विचारातच गुंग होतं.


तात्यांची शेती कमी असल्यामुळं ट्रॅक्टरनं मशागत करून परवडणारं नव्हतं.त्यांचं म्हणणं असायचं की,विकतचं बी-बियाणं आणि महागड्या खतांचा वापर करण्यापेक्षा गारीत कुजलेलं शेणखत टाकून मातीचा पोत जपायचा. ज्यांची शेती जास्त आणि घरात माणसं कमी,त्यांना ट्रॅक्टर परवडतोय.कमी खर्चात पारंपरिक शेती करताना भले उत्पादन कमी झालं,तरी कसदार धान्य पिकतं. ज्याच्या वाट्याला कमी शेती आहे,त्यांनी बांधावर बसून शेती पिकवू नये.दावणीची चार जनावरं ही शेतकऱ्याचा दागिनाच असतोय.घरात दुभतं जनावर असलं तर पोरं धष्टपुष्ट होणारच.


श्रीपतीतात्यांना एकच पोरगा.तसा तो शांत स्वभावाचा. वडील वारकरी असल्यानं मुलाचं नाव सोपान ठेवलं. त्याच्या आईची इच्छा होती की,सोपानला पाठीराखा भाऊ असावा आणि राखी बांधायला बहीण असावी. पोरगी कधीतरी स्वयंपाकात मदत करील आणि आपल्या माघारी हंबरडा फोडून गाव गोळा करील. पोरगी नांदायला गेली,तरी ती येईपर्यंत आई-वडिलांचं प्रेत दारात थांबवून ठेवतात.नाही तर पोरं लगेच लोटकं उचलून निघालं,

असा आईचा समज. वडील वारकरी संप्रदायातील.एकतर आपल्याला जमीन थोडी.रहायला दोनआखणी घर.त्यात वाटण्या करून भावाभावात भांडणं कशाला म्हणत एक मुलगा बास.अशा विचाराचे तात्या.त्यांनी मुलावरपण चांगलं संस्कार केलं. 


सोपानला सुपारीच्या खांडाचंपण व्यसन नव्हतं. कोणाशी लांडीलबाडी नाही की,चोरीचपाटीत कधी नाव नाही.दरवर्षी पारायणात ग्रंथ वाचायला बसायचा.कोणी हाक मारली तर कामाला नाही म्हणत नव्हता. गोठ्यातल्या जनावरांचं शेण काढण्यापासून वैरण आणणं,औत धरणं किंवा पिकाला पाणी पाजणं अशी शेतातील सगळी कामं तो करायचा.घरात आईला मदत करायला लाजत नव्हता.गिरणीतनं दळणकांडप आणणं,

दुकानातनं किराणा सामान आणणं हे तर नित्याचंच;पण आई आजारी असली किंवा रानात काम करून दमली असली,तर घरातील भुई शेणानं सावरायचा,तांदूळ निवडून शिजत घालून भाकरीला पीठ मळायचा.खरकटी भांडी घासून धुवायचा.इतका गुणी मुलगा कधी आई-वडिलांना उलट उत्तर देताना शेजाऱ्यांनी ऐकलं नाही.असा हा कष्टाळू सोपान अभ्यासात एक नंबर नसला तरी शिक्षकांची कधी तक्रार येईल इतका कमी नव्हता.चांगले शिक्षण घेऊन शिक्षक होण्याचं स्वप्न उराशी बाळगून होता.


तात्यांनी आज उजाडल्यापासून रानात औताला सुरुवात केली होती.सूर्य डोक्यावर यायच्या आधी कुळवून संपवायचं ठरवलेलं.

बांधाकडंला झाडाच्या मुळ्यात कुळवाची फास आडकू नये म्हणून तात्यांनी स्वतःदावी हातात घेतली.अर्ध्यापेक्षा ज्यास्त काम उरकल्यावर पोराच्या हातात कासरा देऊन तात्या पलीकडच्या उसात घुसलं.त्यांनी कोंबाच्या आणि कवळ्या बांड्याच्या चार- पाच पेंड्या काढून आणल्या.तोवर सोपान औत पुरं करून बैलांना शेजारच्या पाटात पाणी पाजून छपरात घेऊन आला.बैलं दावणीला बांधून आंब्याच्या झाडाखाली घोंगडं टाकून बसला.आई जेवण घेऊन आली.तात्यांनी बैलाच्या पुढ्यात वैरणीच्या पेंढ्या टाकल्या आणि हाता-पायावर पाणी घेतलं.तिघांनी मिळून भाकरी उचलल्या.सोपानला गेले तीन महिने खानावळीतलं खाऊन कंटाळा आला होता.त्यात आज सकाळपासून कुळवावर हादरून कडकडीत भूक लागलेली.आईच्या हातची चुलीवर खरपूस भाजलेली भाकरी,भरलं वांगं,झुणका बघितल्यावर त्याच्या तोंडाला पाणी सुटलं.दोन भाकरी खाऊन भात खाल्ला,वर ताकाचा पेला रिता केला आणि ढेकर दिला,तसा आईचा चेहरा समाधानानं खुलला.


 उन्हाची किरणं तिरकी होईपर्यंत सोपाननं झाडाखाली ताणून दिली.तोवर कारभारणीच्या संगतीनं तात्यांनी अर्धअधिक रान वेचून कचऱ्याचं ढीग केलं.थोड्या वेळानं सोपान उठला आणि त्यानं सगळं ढीग पाटीत भरून ओढ्याच्या काठावर टाकलं.

दिंडाला बैलं जुपली. दिवस मावळतीकडं कलला तसं त्याच्या आईची आवराआवर सुरू झाली.जेवणाची रिकामी भांडी आणि त्यात थोडं जळण घालून बुट्टी डोक्यावर घेतली आणि तिनं घराची वाट धरली.तिला संध्याकाळच्या स्वयंपाकाचं वेध लागलं होतं.

आज पुरणपोळीचा बेत होता.तसं बघितलं तर रविवारी कुरवाड्यांच्या घरात वशाटाचा वास घमघमतो;पण श्रीपतीतात्या वारकरी. घरात रोज पोथी वाचली जायची.त्यामुळं हे कुटुंब शाकाहारी होतं.सोपानला पुरणपोळी आणि कटाची आमटी जास्तच आवडायची.शेवटी आईच्या हातच्या आमटीची चव कुठंच नसते,हे तो पक्कं जाणून होता.


संध्याकाळी जेवणखाण आटोपून आजूबाजूच्या आयाबाया गोळा झाल्या की,वडील पंढरीतून आणलेली पोथीपुराणं वाचून दाखवत.

आज मात्र सोपानवर वाचनाची जबाबदारी आली होती.गावातील काही घरांत टी.व्ही.आला,तसा कीर्तनाला येणाऱ्यांचा ओघ कमी झाला;पण श्रीपतीतात्यांच्या घरात टी.व्ही.नव्हता. पोरगा शिकून मोठा झाला तसा वडील त्याला पोथी वाचायला लावायचे आणि आपण ऐकायचे. 


दिवसभराचा थकवा निघून जायचा.शिवाय उगीच पारावर बसून गावाच्या कागाळ्या ऐकण्यापेक्षा घरात बसून ओव्या ऐकलेल्या बऱ्या,हा सरळ आणि साधा विचार श्रीपतीतात्यांनी रूजविला होता.याचा फायदा असा झाला की,घरात कोणी एकमेकांना खेकसत नाही. कोणी कोणाशी भांडत नाही.एखादा विचार पटला नाही तर 'रामकृष्ण हरी' म्हणत पुढे निघून जावं.शब्दानं शब्द वाढवून वाद घालत बसायचं नाही.जे योग्य आहे ते काळ ठरवेल.

मुखी पांडुरंगाचं नाव घ्यावं.मनात वाईट विचारांना थारा नाही.

वडील स्वतः निर्व्यसनी.त्यामुळं पोराच्या तोंडाला कधी वास आला नाही.कधी चोरी-लबाडी नाही.पोराला शिकवून मास्तर करावं,ही त्यांची माफक अपेक्षा.सोपन आता जिल्ह्याच्या ठिकाणी विज्ञान शाखेत पदवीच्या दुसऱ्या वर्षात शिकत होता. पदवीनंतर बी.एड्.करायचं ठरवलं होतं.


वाघीण-प्रतिक पाटील-स्वच्छंद प्रकाशन कोल्हापूर


दोन दिवस सुट्टीला घरी आलेला सोपान सोमवारी सकाळची पहिली गाडी पकडायचा;तरच त्याला महाविद्यालयात वेळेवर पोहोचता येत होतं.महिनाभर पुरंल इतका शिधा सोबत घेऊन तो घरातून बाहेर पडला.गावातल्या बायका नळावर पाणी भरायच्या लगबगीत होत्या.रात्री अचानक आलेल्या अवकाळी पावसानं चांगलाच धुमाकूळ घातला होता.त्यामुळं सकाळी हवेत गारठा पसरलेला.प्रत्येकजण आपापल्या कामात गुंतलेला.कोणी दारात उभा राहून दात घासत होतं,तर कोणी टमरेल घेऊन पांदीची वाट धरलेली. कोणी दुधाची भांडी घेऊन वस्तीवर निघालेलं.सकाळी शाळेत जाणाऱ्या पोरांचीदेखील घाई सुरू होती.


काही क्षणापूर्वी एस.टी.साठी गेलेला सोपान घराकडं परत येताना दिसला.सोबत कोणीतरी पोरगी होती. गावातल्या बायका आश्चर्यानं डोळं फाडून त्या दोघांकडं एकटक बघू लागल्या.'आगं ही तर ती ओढ्याकाठची संगी.हिच्या खांद्यावर हात ठेवून हा सोपान तिला घराकडं घेऊन का निघालाय?' बायकांच्या चर्चेला नवाच विषय मिळाला.त्या एकमेकींच्या कानाजवळ पुटपुटू लागल्या.

प्रत्येकजण आपापल्या परीनं तर्क लावायला लागलं.सुतावरून स्वर्ग गाठणाऱ्यांची संख्या आपल्याकडं खूपच आहे.


संगी लहानपणी सोपानच्याच वर्गात शिकत होती. वडील दारूडा.

आई मोलमजुरी करून घर चालवायची. बाहेरच्या गावातून पोट भरायला या गावात आलेलं हे कुटुंब.त्यांना जमीन नाही की शेती नाही.गावाबाहेर ओढ्याच्या काठावर झोपडी बांधून राहिलेलं.बाप दारूच्या आहारी जाऊन त्याच्या कर्मानं मरून गेला, त्यावेळी संगी अवघ्या दोनच वर्षांची होती.उमलत्या कळीच्या वाट्याला आलेलं तिच्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं दुःख.मग घराची सगळी जबाबदारी आईवर पडणं साहजिकच.आई गावातल्या प्रत्येकाच्या शेतात कामाला जायची.पोरीनं शिकावं म्हणून तिनं संगीला शाळेत पाठवलं.संगी सातवीत असताना आईनं आजारपणात अंथरुण धरलं,तसं संगीनं शाळा सोडून मोलमजुरी करून आईला सांभाळलं.दोन वर्षांपूर्वी आईपण गेली.आई-बापाचं छत्र हरवल्यामुळं पोरसवदा संगी पोरकी झालेली.तरीही तिनं जिद्द हरली नाही.ती एकटीच झोपडीत राहून उदरनिर्वाह करू लागली. ओढ्याच्या घाण वासानं झोपडीत कोणी जात नव्हतं.


काल रात्रीच्या अवकाळी पावसानं तिची झोपडी वाहून गेली.तिच्यासोबत संगीचा सगळा भूतकाळ धुवून गेला.रात्रभर ती पावसात देवळाच्या ओसरीवर कुडकुडत बसली होती.

अंगावरच्या भिजलेल्या कपड्याशिवाय तिच्याकडे काहीच नव्हतं.

सोपान घाईघाईनं एस.टी. स्टँडकडं चालला असता,त्याचं लक्ष संगीकडं गेलं.तो तिच्याकडं विचारपूस करायला गेला. 


त्यावेळी सारा प्रकार तिनं त्याला सांगितला. मागचा-पुढचा विचार न करता सोपाननं तिला सोबत घेऊन आपल्या घरचा रस्ता धरला.अंग चोरून घेऊन संगी सोपानसोबत घरी जाताना वाटेत बघणाऱ्यांच्या भुवया उंचावल्या.दारात उभा राहूनच सोपाननं आईला हाक मारली आणि जोरात म्हणाला, "आई,तुला मुलगी पाहिजे होती ना.बघ मी तुझ्यासाठी तिला घेऊन आलोय." सोपान असा अचानक परत का आला म्हणून त्याचे आई-वडील धावतच दारात आलं आणि समोरचं दृश्य बघताना दोघांच्या तोंडातनं एकदम शब्द बाहेर पडलं... "आरं, ही तर ओढ्याकाठची संगी हाय.इकडं का घेऊन आलाईस तिला?"


'हिची आई मरून गेल्यापासून ती एकटीच झोपडीत रहात होती.कालच्या पावसानं झोपडी वाहून गेली.हिची आई शाळेच्या बाहेर पेरू,चिंचा,लेमनच्या गोळ्या विकायची.त्यावेळी मी तिला मावशी म्हणून हाक मारत होतो.माझ्याकडं पैसं कमी असलं तरी ती मला कधी माघारी पाठवत नव्हती.संगी आमच्या वर्गात होती.आई आजारी पडली त्यामुळं ती शाळा सोडून मोलमजुरी करायची.आईपण देवाघरी गेल्यामुळं आता तिला कुणाचाच आधार नाही.तिच्या पाठीशी मी भाऊ - म्हणून उभा राहणार हाय.आपण तिला शाळा शिकवून तिचं कन्यादान आपण करूया.'


सोपानचं विचार कानावर पडताच वडिलांनी आकाशाकडं बघत देवाचं मनोमन आभार मानलं आणि त्यांनी अक्षरशः लेकाच्या पायावर डोकं ठेवलं आणि म्हणालं, 'पोरा आज तुझ्या मुखातून माझा भगवंत बोलला. जे का रंजले गांजले,त्यासी म्हणे जो आपुले, देव तेथेची जाणावा.पोरा पोथी पुराण वाचणं चांगलं हाय;ते आचरणात आणणं आवश्यक हाय.ते तू केलंस. इतक्या दिवसांत कधी जाणवलं नाही;पण आज हिच्या रूपात आमच्या दारात मुक्ताई आली...'

२०/१२/२४

रॅफची तडजोड / Raph's Compromise

नेटाने संपत्ती निर्माण करते आणि मग ही संपत्ती झिरपून सर्व समाजाची भरभराट होते.शासनाचे हस्तक्षेप ही बाजारहाटात केलेली अवाजवी,फाजील ढवळाढवळ ठरते.ती टाळावी.

शासकीय यंत्रणा फुगू देऊ नये, शासनाचा खर्च कमीत कमी राखावा.बेरोजगार भत्ता, ज्येष्ठ नागरिकांची सुरक्षा,शिक्षण,

विज्ञान ह्या सगळ्यांवरच्या खर्चाला कात्री लावावी.शासकीय खर्च वाचवून कर कमी करावे.विशेषतःश्रीमंतांवरचे प्राप्ती कर,संपत्ती कर,वारसा कर कापावे.कारण जास्त प्राप्तीतून धनिक अधिक बचत करतील,ती उत्पादनात गुंतवतील,

परिणामी अर्थव्यवस्था हळूहळू भरभराटीस येईल आणि सर्व थरावरचा समाज अधिकाधिक समृद्ध होईल.


ह्या कल्पनेच्या डोलाऱ्याने अनेक विचारवंत भारावून गेले आहेत.अमेरिकेच्या साम्यवादाविरुद्धच्या दीर्घ काल चाललेल्या शीत युद्धामुळे ह्या मांडणीची त्या देशातील सामान्य जनमानसावरही सहजी पकड बसली आहे.ह्या मनोवृत्तीचा धनिकांनी फायदा उठवला,आणि १९८० च्या दशकात रोनाल्ड रीगनच्या राजवटीत आपल्याला अनुकूल धोरणांची नेटाने अंमलबजावणी करून घेतली. अमेरिकी फेडरल रिझर्व बँकेचे गेल्या पंचवीस वर्षांतील प्रमुख झालेले मान्यवर अर्थतज्ज्ञ ग्रीनस्पॅन व बेर्नान्के हेही या बाजारपेठी पंथाचे कट्टर पुरस्कर्ते आहेत. त्यामुळे अमेरिकेची सारी अर्थव्यवस्था ह्या विचारधारेनुसार वळवली गेली आहे.पण स्टिग्लिट्झ दाखवून देतात की वास्तवात ह्या मांडणीत सुचवल्याहून फार वेगळे घडले आहे,घडते आहे.ह्या विपर्यासातून निर्माण झाली आहे एक डबघाईला आलेली अर्थव्यवस्था,अन्याय्य राज्यव्यवस्था,विषम, दुभंगलेला समाज – अन् अंती आजची सर्वांगीण दुर्दशा.


जर बाजारहाटाच्या माध्यमातून बळकट अर्थव्यवस्था निर्माण व्हायची असेल तर त्यासाठी सच्ची खुली स्पर्धा पाहिजे.ग्राहकांना एकमेकांशी चढाओढ करणाऱ्या अनेक उत्पादकांपैकीच्या कोण्या एकाचे उत्पादन विकत घेण्याची मुभा पाहिजे.जनतेला काय चालले आहे ह्याची परिपूर्ण माहिती पाहिजे.म्हणजे उत्पादकांना अद्वातद्वा फायदा उकळता येणार नाही.ते कसोशीने, काटकसरीने उत्पादन करतील.पण समाजधारणेसाठी केवळ अशी खुली स्पर्धा पुरेशी नाही.सगळ्या समाजाला,पुढच्या पिढीला चुकवावी लागणारी किंमत बाजारपेठेच्या माध्यमातून लक्षात घेतली जाणार नाही. यासाठी शासनाने नेटका हस्तक्षेप करून,

प्रदूषणाचा बोजा उद्योजक निश्चितपणे सगळ्या समाजावर लादत नाहीत ना,नैसर्गिक संसाधने उचित मोल देऊन वापरली जात आहेत ना,ह्यांची खात्री करून घेतली पाहिजे. 


तसेच मक्तेदारीला अजिबात वाव नसेल,खरोखरीची खुली स्पर्धा राबत असेल,शासन डोळ्यात तेल घालून नैसर्गिक संसाधने जपत असेल,पर्यावरण सांभाळत असेल,दूरदृष्टीने धोरणे राबवत असेल,

तरच मुक्त बाजारपेठेच्या माध्यमातून टिकाऊ आर्थिक विकास होऊन सर्व समाजाची भरभराट होईल.


पण अमेरिकेत प्रत्यक्षात काय घडते आहे,हे समजून घेण्यासाठी उद्योजकांना,व्यापाऱ्यांना ते समाजासाठी जे योगदान करताहेत त्याला समर्पक एवढाच प्रमाणबद्ध आर्थिक लाभ होतो आहे,का भरमसाट प्राप्ती होते आहे, हे नीट तपासून पाहिले पाहिजे.जर योगदानाच्या मानाने अयोग्य,अवाच्या सवा नफा होत असेल,तर अर्थशास्त्रज्ञ त्याला ही खंड वसुली (rent seeking ) चालली आहे असे म्हणतात.जमीनदार काहीही परिश्रम न करता पैसा कमावतात,तशी ही आधुनिक संदर्भातील खंड वसुली.अशी खंड वसुली पोसणाऱ्या अमेरिकी व्यवस्थेत आर्थिक,सामाजिक विषमता भडकते आहे,सत्ताधीश मूठभर लोकांचे हितसंबंध जपताहेत,कायदे खुंटीला टांगून ठेवले जात आहेत.ही खंड वसुली अनेक प्रकारे चालते,तेव्हा ह्या संज्ञेची फोड करणे आवश्यक आहे. ह्याचे चार पैलू आहेत : लाटा-लाट,लुटा-लूट,फसवेगिरी आणि फुकटबाजी स्टिग्लिट्झ ह्या चतुर्विध उपद्व्यापांचे सोदाहरण विवेचन करतात.


अमेरिकी शासन युद्धयंत्रणेवर प्रचंड खर्च करते.बुश पिता-पुत्रांनी इराक - अफगाणिस्तानच्या युद्धांवर अचाट खर्च केला,आणि त्या बोजाने अमेरिकी अर्थव्यवस्था व्याधिग्रस्त झाली.युद्ध सामुग्रीची खरेदी करताना काहीही पथ्ये पाळली जात नाहीत,उत्पादक जी काय मागणी करेल ती मान्य केली जाते.आंधळा दळतो,कुत्रे पीठ खाते,अशा थाटात सारा व्यवहार चालतो. 


साहजिकच युद्ध सामुग्रीचा पुरवठा करणाऱ्यांना भरमसाट किमती लावून बेसुमार नफा उकळण्याची चटक लागली आहे.अशा लाटालाटीत जॉर्ज बुशच्या काळी उपराष्ट्राध्यक्ष असलेल्या डिक चेनीनेही व्यवस्थित हात धुऊन घेतले.


अशीच लाटा-लाट औषधांच्या पुरवठ्यात चालते.अगदी जाणून बुजून जॉर्ज बुशच्या काळात शासनाने औषधांच्या किमती खुल्या बाजारात ठरवल्या जाव्या ही रूढी बंद केली व औषध कंपन्यांच्या मनमानीला दार मोकळे केले.ह्यामुळे अमेरिकी नागरिकांना औषधांसाठी निष्कारण अतोनात जास्त पैसे मोजावे लागतात.वर सरकारी आरोग्य विमा जास्त कार्यक्षम आहे असा स्पष्ट पुरावा असतानाही


खाजगी कंपन्यांना चरायला कुरण मोकळे करून दिले. साहजिकच इतर उद्योगप्रधान देशांशी तुलना करता अमेरिकेतील आरोग्य सेवा कमी प्रतीची आणि जास्त खर्चीक पडते,व अनेकांना परवडत नाही.


विकासाचे अनेक पैलू आहेत.मानवनिर्मित उत्पादन हा त्यातला एक पैलू झाला.पण त्या सोबतच नैसर्गिक संसाधनांचे जे भांडार आहे ते सांभाळणे,मानवी क्षमता, सामाजिक क्षमतांची भांडवले विकसित करणे हेही महत्त्वाचे आहे.तेव्हा आर्थिक वाढीचा हिशोब करताना जर नैसर्गिक संसाधनांत घट होत असेल तर ते उणेच्या बाजूत नोंदवलेच पाहिजे.न पेक्षा एकूण आर्थिक प्रगतीचे चुकीचे चित्र डोळ्यासमोर ठेवले जाईल.हे विचारात घेऊनच शासनाने उद्योजकांकडून नैसर्गिक संसाधनांचे मोल ठीकठाक वसूल केले पाहिजे.आज अमेरिकेत हे होत नाही व कोळशासारखी नैसर्गिक संसाधने खाण मालकांना फार स्वस्तात उपलब्ध करून दिली जातात.ही लुटालूट थांबवण्यासाठी अमेरिकी राष्ट्राध्यक्ष क्लिन्टनच्या आर्थिक सल्लागार समितीचे अध्यक्ष असताना स्टिग्लिट्झनी नैसर्गिक संसाधनांतील घटींचे सुव्यवस्थित लेखापरीक्षण सुरू व्हावे असा प्रस्ताव मांडला.पण कोळशाचे खाण मालक व त्यांचे राजकारणी पाठीराखे ह्यांनी तो हाणून पाडला.प्रदूषणातूनही नैसर्गिक संसाधनांची घट होते.तेव्हा अशा घटींचाही सुव्यवस्थित हिशोब करून प्रदूषकांकडून शासनाने त्याचे मोल वसूल करून घेतले पाहिजे. अमेरिकेत हेही होत नाही.ब्रिटिश पेट्रोलियम ह्या कंपनीच्या समुद्रातील तेल विहिरींच्या

गैरव्यवस्थापनामुळे २०१० साली अचाट तेल गळती होऊन सागरी नैसर्गिक संसाधनांचे,स्थानिक जनतेचे मोठे नुकसान झाले.

त्याबाबत कंपनीला जो दंड भरायला लागला तो अगदी जुजबी होता.त्यांच्याकडून खूप जास्त नुकसान भरपाई वसूल करणे आवश्यक होते.आज बाजारहाटातील व्यवहार अनेक दृष्टीने सदोष आहेत,तेव्हा त्यांवरच विसंबणारी धोरणे ठरवणे योग्य नाही हे सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ दिसत असले,तरी अमेरिकेतील अनेक प्रभावी अर्थतज्ज्ञ ह्याच विचारसरणीचा पुरस्कार करत,त्यावर आधारित धोरणे राबवीत आहेत.ह्या धोरणांतून अमेरिकेतील एक टक्का सर्वाधिक श्रीमंत राष्ट्रीय उत्पन्नाचा आज त्यांना मिळत असलेला अन्याय्य हिस्सा आणखीच वाढवत आहेत. ह्यांच्या पाठीराख्यांतील विशेष महत्त्वाच्या दोन व्यक्ती म्हणजे अमेरिकी फेडरल रिझर्व बँकेचे प्रमुख ग्रीनस्पॅन व बेर्नान्के.त्यांच्या आग्रहामुळे ही शासकीय बँक खाजगी बँकांना अत्यल्प व्याज दराने पैसे वाटते,आणि त्या बँका काहीही परिश्रम न करता तेच पैसे अधिक जास्त व्याज दरात सरकारकडे गुंतवतात व अगदी फुकटाफाकट अब्जावधी डॉलर खिशात घालतात.ह्या उफराट्या व्यवहाराला सर्व फेडरल रिझर्व्ह बँकेच्या सदस्यांचा पाठिंबा आहे असेही नाही,परंतु त्यांचे काही चालत नाही.आज अमेरिकेत व इतरत्रही जगात जो आर्थिक विकास होत आहे त्याचा पाया आहे आधुनिक तंत्रज्ञानातून सुधारणारी उत्पादकता.पण ह्यामुळे मनुष्यबळाची गरज सारखी घटत आहे.परिणामतः बेकारी भडकत आहे.तंत्रज्ञानाची व उत्पादकतेची प्रगती चालू राहणे अपरिहार्य आहे.ह्यातून मार्ग काढलाच पाहिजे व म्हणून शिगेला पोचलेल्या बेकारीवर मात करणे हे अमेरिकेच्या आर्थिक धोरणाचे महत्त्वाचे उद्दिष्ट मानले पाहिजे.पण आज ह्याकडे पूर्ण दुर्लक्ष होते आहे. 


केवळ व्याजाच्या दरांशी खेळ खेळत,शासकीय खर्च अधिकाधिक कापत,श्रीमंतांवरचे कर कमी कमी करत सगळे प्रश्न सोडवण्याचे अगदी चुकीच्या दिशेने प्रयत्न चालू आहेत.सरकारी अंदाजपत्रक तुटीचे नसावे असा अकारण बाऊ करत ज्या तंत्रज्ञान विकासातून गेल्या शतकाच्या उत्तरार्धात अर्थव्यवस्था भरभराटीस आली त्या विज्ञान - तंत्रज्ञानांना पोषक अशा कार्यक्रमांचे पैसे तोडले जाताहेत.इतरही विषमता आटोक्यात ठेवणारे सरकारी कार्यक्रम खच्ची होताहेत.पण धनिकांकडून नीट चोपून कर घेतला जात नाही.आज अमेरिकेत धनिक निर्धनांहून उत्पन्नाच्या कमी टक्के कर भरताहेत.मालकीच्या घरांतून बाहेर काढले गेले आहेत,चांगली आरोग्य सेवा,चांगले शिक्षण उपलब्ध नाही,बेकारीच्या खाईत लोटले गेले आहेत,पण बेरोजगारातील संरक्षणकवच नाही अशा विपन्नावस्थेत आज बहुसंख्य अमेरिकी नागरिक अडकले आहेत.मी Change you can believe in अशी आणून दाखवीन अशी आश्वासने देणाऱ्या ओबामांनीही जुनीच धोरणे राबवत त्यांची निराशा केली आहे.


परिणामी लोक हताश आहेत,मतदानाबाबत उदासीन झाले आहेत.उलट धनिकांना निवडणुकीसाठी वाटेल तेवढा पैसा ओतता येतो, त्यावरची बंधने शिथिल केली गेली आहेत.म्हणून 

पैशाच्या बळावर लोकप्रतिनिधींना सहज नाचवता येते.


लोकशाही म्हणजे एका व्यक्तीला एक मत असा सिद्धान्त आहे.पण आज अमेरिकेत एका डॉलरला एक मत अशी दुःस्थिती निर्माण झाली आहे.लोकशाही म्हणजे लोकांचे,

लोकांसाठी,लोकांतर्फे सरकार असाही सिद्धान्त आहे.पण आज अमेरिकेत एक टक्क्यांचे,एक टक्क्यांसाठी,एक टक्क्यांतर्फे सरकार असेच दारुण वास्तव दिसत आहे.


१८.१२.२४ या लेखातील शेवटचा भाग…



१८/१२/२४

रॅफची तडजोड / Raph's Compromise

युरोपातील साम्राज्यवादी देशांनी अमेरिका ऑस्ट्रेलियात मूलवासीयांना खच्ची करून नवयुरोप वसवले.त्यांत आफ्रिकेतील गुलाम राबवले,आणि दुसऱ्या महायुद्धापर्यंत आशिया आफ्रिका खंड पारतंत्र्यात खितपत ठेवले.

नवयुरोपाच्या मुबलक साधन-संपत्तीचा, आशिया आफ्रिका खंडांतून शोषून घेतलेल्या संसाधनांचा,आणि भराभर विकसित होणाऱ्या विज्ञान - तंत्रज्ञानाचा आधार घेऊन युरोप नवयुरोप आर्थिक भरभराटीत राहिले.आशियाई आफ्रिकी देशांची हळूहळू अधोगतीच होत होती.दुसऱ्या महायुद्धाच्या शेवटी भारताचे दरडोई अन्न उत्पादन रसातळाला पोचले होते. दुष्काळात मोठ्या प्रमाणावर भूकबळी पडत होते. एवढ्यात युरोपीय राष्ट्र,जपान यांच्या स्पर्धेतून दोन महायुद्धे झाली.

रशिया दुसऱ्या महायुद्धातील विजेत्या गटांत होता.पण समतेचे तात्त्विक प्रतिपादन करणाऱ्या रशियानेसुद्धा पूर्व युरोप - मध्य आशियात स्वतःचे एक साम्राज्यच प्रस्थापित केले होते. सर्वच तत्त्वप्रणालींचा विपर्यास करण्यात मनुष्यप्राणी तरबेज आहे.समाजात मूठभर भांडवलशहा श्रमिकांचे शोषण करतात,ते थांबवले पाहिजे.ह्यासाठी सर्व उत्पादन साधने समाजाच्या मालकीची केली गेली पाहिजेत असे प्रतिपादन करत रशियात एकोणीसशे अठरा सालची राज्यक्रांती झाली


त्यातून सत्तेवर आलेल्या कम्युनिस्ट पक्षाने काही वर्षांतच एक पक्षकार्यकर्त्यांची जुलमी यंत्रणा विकसित केली.प्रथम त्यांनी जवळजवळ गुलामांचे आयुष्य कंठणाऱ्याच शेतमजुरांना जमीनदारांच्या जुलमातून सोडवले,पण नंतर हळूहळू पक्षयंत्रणेच्या जुलमाखाली भरडले.अखेर ह्या सगळ्या विपर्यस्त व्यवस्थेच्या दुःखस्थितीतून चीन-क्युबासारखे अपवाद वगळता इतर कम्युनिस्ट राजवटी कोलमडल्या.


हा साम्यवादाचा विपर्यास खूप ठळकपणे लोकांच्या मनावर बिंबवणे हा अमेरिकी सत्ताधीशांचा आवडता उद्योग होता.कारण ह्या विपर्यासाबद्दल प्रचार करत आपण दुसऱ्याच बाजूने जो अत्याचार चालवला होता त्याचे समर्थन करता येत होते.हार्वर्डच्या विद्वानांत, विद्यार्थ्यांत हे वाद चालूच होते.वारूळ पुराणाचा नायक रॅफ स्वतःह्या वादात कसा सामील झाला आणि अखेर प्रस्थापित भांडवलशाही व्यवस्थेतच सहभागी होऊन मार्ग काढला पाहिजे ह्या निर्णयाप्रत कसा आला,हे अँटहिलच्या कथेचे महत्त्वाचे सूत्र आहे. विल्सननी स्वतःमान्य केलेली,त्यांचा कथानायक रॅफ जिला अनुसरून एका बांधकाम व्यावसायिकांच्या कंपनीसाठी काम करू लागतो,ती विचारसरणी सांगते की,खुल्या बाजारपेठेत जे व्यवहार चालतात,तीच जगातील सर्वोत्कृष्ट अर्थरचना आहे,त्यातूनच सर्वांचे भले होईल.पण अगदी उघड आहे की ह्या अर्थव्यवहारांतूनच निसर्गाचा मोठा विध्वंस चालला आहे.विल्सनना तर निसर्ग वाचवायचा आहे.तेव्हा रॅफच्या माध्यमातून ते तोड सुचवतात - श्रीमंतांच्या निसर्गप्रमाचा फायदा घेत-घेत हा निसर्ग वाचवावा.ह्याचे चित्रण रॅफच्या त्याच्या मामाबरोबरच्या संवादात केलेले आहे:


बघ, रॅफ, तुला जेप्सन-नोकोबी परगणे नेहमीच गांवंढळ राहून हवेत का? एक पाहा,सगळ्या भागात विकास होणारच.आपला भाग भरपूर सूर्यप्रकाशाचा, सौम्य हिवाळ्याचा आहे.त्याला सूर्यपट्टयां म्हणायला लागले आहेत! आणि मोबील,पेन्साकोला हे तर सूर्यपट्ट्यातही विकासाच्या वेगासाठी प्रसिद्ध होताहेत.राईट?


रॅफ दबला.हळूच उत्तरला, 'येस्सर!' त्याला सायरसमामाचं म्हणणं पटत नव्हतं,पण सभ्य,सौम्य असं उत्तरही नव्हतं त्याच्यापाशी,


"काय होतं पूर्वी,आणि आज काय आहे?" मामानं हल्ला सुरू ठेवला."तुझे आजोबा लहान असताना मोबीलच्या दक्षिणेला काहीच विकास झाला नव्हता.डॉग नदीपासनं सीडार पॉइंटला गेलात,तर दोनपाच घरं फक्त दिसायची. रस्त्याच्या शेवटच्या भागात तर डांबरीकरणही केलं नव्हतं,हो ना?"


रॅफनं नुसतीच होकारार्थी मान हलवली.


"आणि सीडार पॉइंटला धडपडत पोचलं,की डॉफिन बेट दिसायचं. शसुंदर होतं ते! छान वाळवंटी किनारपट्टी. एका टोकाला यादवीच्या काळातला किल्ला.पण बोट भाड्यानं घेऊन जावं लागायचं.बहुतेक बेट रिकामं होतं. आणि आज पाहा,सगळा इथून तिथला भाग विकसित झाला आहे.उद्योगधंदे बहरताहेत.डॉफिन बेटावर जायला पूल झाला आहे.ॲलाबामा राज्याच्या अर्थव्यवस्थेतला महत्त्वाचा भाग आहे तो.याला विकास म्हणतात,रॅफ ! प्रगती आहे ही!"


रॅफ हरला होता.


"अमेरिका बुडावर बसून थोर नाही झाली,रॅफ ! कठोर होऊन, युद्ध खेळून आपण मोठे झालो.इतिहास वाच तू -- शाळांमध्ये शिकवतात तो बायल्यांचा, डाव्यांचा इतिहास नाही.खरा इतिहास ! देवानं जे आपल्याला दिलं,ते घ्यायला रेड इंडियनांना हाकलावं लागलं.मेक्सिकोशी लढून पॅसिफिक किनारा गाठता आला.देश दुप्पट झाला त्या लढाईनं.चांगलं- वाईट ठरवत नाही मी. मी जग कसं चालतं ते सांगतो आहे तुला.वाढत जा,नाहीतर नष्ट व्हा! "


रॅफचा योजनेचा गाभा होता,नोकोबीच्या तीरावर मूठभर छोट्या इस्टेटी घडवणं,हा.प्रत्येक घराला तलावापर्यंत जाता येत होतं.सर्व घरांना एक रस्ता जोडत होता, आणि तो चौक्या बसवून पूर्णपणे खाजगी राखला होता. सगळ्या घरांना बोटींसाठी एकच सामायिक धक्का दिला होता.प्रत्येक घराला एकीकडे तलाव आणि दुसरीकडे राखीव जंगल होतं.मध्यमवर्गाला इथे जागा नव्हती,पण श्रीमंतांना श्रीमंती दरानं घरं देऊन कमी खर्चात मूळ अपेक्षित फायदा कमावता येत होता.


"आणि आणखीन एक बाब पाहा.आपण धोक्यातले कोणते परिसर वाचवले,कोणत्या जीवजाती वाचवल्या, याची भरपूर जाहिरात करू शकतो.नोकोबीला प्रसिद्ध करू शकतो.या राज्यात किती विकास कार्यक्रम असल्या कामाचा दावा करू शकतात?आणि किती जागी घरांमधून पायी जाऊन अशा जाती पाहता येतात ? आपण गव्हर्नरला बोलावू शकतो,उद्घाटनाला ! भरपूर फोटोज् काढल्यानं तोही खूष.आपण जर या योजनेला वनस्पती उद्यान म्हटलं,तर सांभाळेल सरकार,आणि आपल्याला कर कमी करा असं म्हणता येईल !


आणि मागे त्या मुंग्या मारण्यानं मिळालेली अपप्रसिद्धीही मिटवून टाकता येईल!"


अखेर कमी कटकटीत मूळ अपेक्षित नफा,या 'अल्टिमेट सेलिंग पॉइंट'वर रॅफचं म्हणणं त्याच्या मामाने व त्यांच्या भागीदारांनी मान्य केलं.


फुटताहेत हे बुडबुडे


अँटहिलच्या केन्द्रस्थानी आहे अमेरिकेतला बांधकाम व्यवसाय.हे पुस्तक प्रकाशित झाले २०१० साली. २००६ ते ११ ह्या कालावधीत स्थावर मालमत्तेच्या, घरांच्या किमती सतत चढत्या कमानीवर राहिल्या. १९९० नंतरच्या कालात संगणक,

आंतरजाल ह्यांतील क्रांतिकारी प्रगतीमुळे पैसा भराभर हलवणे,अगदी एक सहस्रांश सेकंदातसुद्धा शक्य झाले.ह्याचा फायदा उठवत बँका व इतर आर्थिक उलाढाली करणाऱ्या कंपन्यांनी नवनव्या क्लृप्त्या काढल्या, नवनवी हत्यारे पाजळली. ह्यातून सामान्य लोकांना काय चालले आहे,

आपण कोणत्या अटींवर कर्ज काढतो आहोत,किती व्याज भरतो आहोत हे समजणे अशक्यप्राय होऊन बसले. 


पण मालमत्तेच्या भडकत्या किमतींचा मोह पडून अनेकांनी ऐपतीपलीकडची घरकर्जे काढली.अशा कर्जाच्या फासात लोकांना अडकवत बँकांनी अतोनात पैसे कमावले.हा बुडबुडा काही टिकाऊ नव्हता,तो फुटल्यावर कर्जबाजारी लोकांनी घरे गमावली.

पण अशा बेघर झालेल्या लोकांना वाचवायला सरकारने काहीही पावले उचलली नाहीत.अर्थात ह्याच्या जोडीला लोकांना निष्कारण मोहात पाडणाऱ्या बँकांचेही पैसे बुडाले.जर बाजारपेठ खरीच मुक्त असती तर लोकांना दारिद्र्याच्या खाईत लोटणाऱ्या बँकांनाही बुडू द्यायला हवे होते.


( 'वारुळ पुराण',माधव गाडगीळ',ई.ओ.विल्सन,संक्षिप्त अनुवाद - नंदा खरे,मनोविकास प्रकाशन )


पण लोकांना काहीही मदत न देणाऱ्या ओबामांच्या सरकारने बँकांना मात्र बुडू दिले नाही.त्यांच्या घशात अब्जावधी डॉलर ओतले,बँकांना तगवले.मग बँक व्यवस्थापकांनी काय केले?


आधी बँकांचे उच्चाधिकारी कार्यक्षमतेसाठी प्रोत्साहन या गोंडस नावाखाली प्रचंड पगार,बोनस खात होते.


आता स्वतःला कार्यक्षम म्हणवून घेणे शक्य नव्हते. तेव्हा सरकारने बँकांत पैसे ओतल्यावर त्यांनी निर्लज्जपणे मोठमोठे बोनस स्वतःला देऊन घेतले, एवढेच की ह्या बोनसचे नाव बदलले.आता कार्यक्षमता प्रोत्साहन नाही - त्यांनी नोकरी सोडून जाऊ नये म्हणून खास प्रोत्साहन असे नाव दिले.तेव्हा अर्थव्यवस्था बुडबुडा फुगताना सुदृढ असल्याचा आभास होता, तेव्हाही बोनस,आणि या बँकर्सच्याच करामतीने ती डबघाईला आल्यावरही शिक्षा सोडाच,

उलट तेवढाच बोनस.हे काही सगळ्यांनीच खपवून घेतले असे नाही. ह्या साऱ्या गैरव्यवहारावर अतोनात जे संतापले त्यांचे एक म्होरके आहेत.जोसेफ स्टिग्लिट्झ हे दिग्गज अर्थतज्ज्ञ.२००१ सालचे नोबेल पारितोषिक विजेते; जोडीला आर्थिक धोरणे घडवण्यात,राबवण्यातही सक्रिय.अमेरिकी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिन्टनच्या आर्थिक सल्लागार समितीचे अध्यक्ष,विश्व बँकेचे प्रमुख अर्थतज्ज्ञ,फ्रान्सचे अध्यक्ष सार्कोझी यांनी स्थापलेल्या आर्थिक विकास आणि सामाजिक प्रगती म्हणजे काय ह्याचा मागोवा घेणाऱ्या आंतराराष्ट्रीय आयोगाचे अध्यक्ष, असा त्यांचा प्रचंड अनुभव आहे.एक सर्वसमावेशक, विशाल दृष्टिकोन ही त्यांची खासियत आहे.ते केवळ अर्थकारणाचा ऊहापोह करत नाहीत,तर अर्थव्यवस्था, राजकारण,समाजकारण,पर्यावरण ह्या साऱ्यांचा साकल्याने विचार करतात.ह्या मुरलेल्या,अनुभवी विद्वानाने अनेक महत्त्वाची पुस्तके लिहिली आहेत.त्यातील सगळ्यात अलीकडच्या पुस्तकाचा विषय आहे विषमतेचे मूलस्रोत व दुष्परिणाम.गेल्या दोन वर्षांत आर्थिक अन्यायाचा,भ्रष्ट राज्यकर्त्यांचा निषेध करत अनेक देशांत अगणित लोक रस्त्यांवर उतरले.स्टिग्लिट्झनी मुद्दाम अरब देशांत जाऊन त्यांच्याशी संवाद साधला.नंतर अमेरिकेत वॉल स्ट्रीटवर उतरलेले लोक तर स्टिग्लिट्झनीच पुरवलेली घोषणा देत होते : हा आहे नव्याण्णव टक्के लोकांचा आक्रोश ! एक टक्का धनदांडग्यांनी अमेरिकेत जो हाहाकार मांडला आहे तो आवरलाच पाहिजे.स्टिग्लिट्झच्या The Price of Inequality पुस्तकाचा भर आहे अमेरिकेवर,

पण त्यांनी जागतिकीकरणाचेही मार्मिक विश्लेषण केले आहे.भौतिकशास्त्रात,जीवशास्त्रात ज्या वेगवेगळ्या संकल्पना मांडल्या जातात त्या पडताळणे तसे सोपे आहे.म्हणूनच डार्विनच्या प्रतिपादनानंतर लवकरच शास्त्रीय जगतात त्याचा सिद्धान्त सर्वमान्य झाला.पण अमेरिकेतल्या लोकमानसात अनेक पूर्वग्रहांमुळे तो अजून मोठ्या प्रमाणात नाकारला जातो.


समाजशास्त्रात,अर्थशास्त्रात भौतिकशास्त्राहून,जीवशास्त्राहून खूप वेगळी परिस्थिती आहे.ह्या शास्त्रांतले सिद्धान्त पडताळणे जास्त अवघड आहे.जोडीलाच ह्या शास्त्रांबद्दल केवळ सामान्य जनतेच्याच नाही,तर शास्त्रज्ञांच्या मनांतही अतोनात पूर्वग्रहांची पाळेमुळे अगदी घट्ट रुजलेली आहेत. अर्थशास्त्रातली अशीच पूर्वग्रहांनी व्यवस्थित पोसलेली विचारसरणी सांगते की मुक्त बाजारहाट अतिशय कार्यक्षम असते.(अपूर्ण उर्वरित भाग पुढील लेखामध्ये)