* विजय गायकवाड | Vijay Gaikawad

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

६/३/२५

तज्ञ / expert

झाडं अतिशय प्रतिकूल परिस्थितीत वाढू शकतात. खरच वाढू शकतात का?त्यांना वाढावेच लागते! एखादी बी जेव्हा जमिनीवर पडते तेव्हा तिची जागा फक्त वाऱ्याने किंवा एखाद्या जनावरामुळे बदलू शकते.आणि एकदा का ती तिथे रुजली की मग आयुष्यभर तिथेच जखडली जाते.आता तिला तिथे जे काय मिळेल त्यावरच समाधान मानायचे असते. बहुतांश रोपट्यांना पुढील काळात मोठी आव्हाने पेलावी लागतात कारण अनेक वेळा बी रुजण्याची जागा फार अनुकूल नसते.


उदाहरणार्थ,एखादी जागा फार सावलीत असेल, जसे भल्यामोठ्या बीच वृक्षाखाली,तर लख्ख सूर्यप्रकाशात वाढणाऱ्या बर्डचेरीच्या रोपट्याला ते प्रतिकूल ठरते.किंवा एखादी जागा प्रखर प्रकाशात असते त्या वेळेस बीचच्या रोपट्यांची पालवी जळून जाते.दलदलीच्या जागेत मुळं कुजून जातात आणि कोरडी वाळू असलेल्या जमिनीत तहानेने मरून जातात.काही जागा उदाहरणार्थ,निकृष्ट जमीन,दगड किंवा मोठ्या झाडांच्या फांद्यांतील बेचकी या बी रुजण्यासाठी अंत्यत दुर्देवी जागा म्हणता येतील.आणि अनेकदा नशीब साथ देत नाही. समजा तुटून जमिनीवर पडलेल्या झाडाच्या लाकडात एखादी बी पडली तर काही दिवसांनी त्याचे रोपटे होईल आणि मूळ कुजणाऱ्या लाकडात शिरतील.पण जेव्हा कोरडा उन्हाळा येतो तेव्हा ते लाकूड सुके पडते आणि रोपट्याचे आयुष्य संपते


अनेक मध्य युरोपीय झाडांच्या प्रजातींच्या बिया रुजण्याचे अनुकूल ठिकाण साधारण एकसारखेच असते.त्यांना पोषणयुक्त,मोकळी,हवेशीर आणि आर्द्रता टिकविणारी माती आवडते.जमीन कोरड्या हवेतही ओलसर राहिली पाहिजे.

उन्हाळ्यात फार तापू नये किंवा थंडीत गारठू नये.बेताचा हिमवर्षाव चालेल कारण त्यातून बर्फ वितळल्यावर जमिनीला पाणी मिळते.तिथे डोंगरामुळे वादळी वारे अडवले गेले पाहिजेत आणि बुरशी किंवा कीटकांचा प्रादुर्भाव कमी असावा.(द हिडन लाईफ ऑफ ट्रीज,पी ट र वो ह्ल ले बे न अनुवाद - गुरुदास नूलकर,अरविंद घनश्याम पाटकर मनोविकास प्रकाशन)


झाडांच्या स्वप्नातले 'स्वर्ग' हे असेच असेल.पण काही तुरळक ठिकाणे सोडली तर अशी परिस्थिती फार क्वचित मिळते.पण हे जैवविविधतेसाठी असंच असणं चांगलं आहे.कारण जर मध्य युरोप हा सगळ्या प्रकारच्या झाडांसाठी असा स्वर्गीय प्रदेश असता तर बीच वृक्षांनी एकट्याने जगण्याची स्पर्धा एकहाती जिंकली असती आणि हा सगळ्या प्रकारच्या झाडांमध्ये फक्त बीचचे वृक्षच दिसले असते.स्पर्धकांना मागे टाकून आपल्याला हवे ते भरपूर ओरबाडून घेऊन अनुकूल परिस्थितीचा फायदा कसा घ्यायचा हे बीच वृक्षांना बरोबर कळते. झपाट्याने वाढून आपल्या पालवीचे आच्छादन केले की खालच्या स्पर्धकांना सूर्यप्रकाश कमी मिळतो.अशा परिस्थितीत जर त्या स्पर्धकाला जीव वाचवायचा असेल तर काहीतरी वेगळी युक्ती लढवायला लागते.पण हे सहज शक्य नसते म्हणून जर बीच वृक्षाशेजारी स्वतःसाठी पर्यावरणीय कोनाडा (इकॉलॉजिकल निश),जागा तयार करायची असेल.

आणि आपली वाढ करून घ्यायची असेल तर त्या झाडाला स्वतःच्या गरजा कमी कराव्या लागतात.काही सोडून द्याव्या लागतात, जगण्यासाठी पर्यायी धोरण आखावे लागते. 


एकूणच बीच वृक्षाखाली अशी स्वतःची जागा तयार करण्याच्या प्रयत्नात झाडाचे जीवन दुष्कर होऊन जाते.पण कोणत्याही अधिवासात असा अनुकूल इकॉलॉजिकल निश मिळत नसल्यामुळे खरंतर आपण झाडांना हव्या असलेल्या अनुकूल परिस्थितीबद्दल बोलणं,आग्रही असणं बरोबर होईल का? आहोत अशा प्रकारच्या प्रतिकूल जागा तर सर्वत्र सापडतात.ज्या झाडांना यात तग धरता येतो ती प्रजाती आपला भौगोलिक विस्तार करू शकते.म्हणजेच आपण झाडांच्या जुळवून घेण्याच्या,प्रतिकूल परिस्थितीतही मार्ग काढून तग धरून राहण्याच्या विजीगीषू वृत्तीबद्दल बोलतोय, नाही का? आणि स्प्रूसच्या झाडाने नेमके हेच केले आहे.कमी उन्हाळा आणि बोचऱ्या थंडीत,उत्तरे पासून ते मध्य युरोपपर्यंत असा या स्प्रूसचा प्रसार आहे.सायबेरिया कॅनडा आणि स्कँडिनेव्हियामध्ये स्प्रूस वाढण्याचा मौसम फक्त काही आठवड्यांचा असतो.अशा परिस्थितीत बीचची पालवीसुद्धा उमलत नाही.आणि त्या कडक थंडीमुळे बीचला हिमबाधा होऊन त्याची वाढ खुंटेल.या प्रतिकूल परिस्थितीत फक्त स्प्रूस तग धरतो.


स्प्रूसच्या सूचीपर्णी पानांमध्ये आणि खोडांमध्ये काही विशिष्ट तेलं असतात ज्यामुळे त्यांच्या शरीरातली द्रव्ये गोठून जात नाहीत.म्हणूनच त्यांची पानं झडत नाहीत आणि ते फांद्यांना ऊब देऊ शकतात.वसंतातल्या सूर्यप्रकाशाचे किरण अंगावर पडताक्षणी ते प्रकाश संश्लेषण सुरू करतात. एकही दिवस वाया घालवला जात नाही आणि साखर आणि लाकडाच्या उत्पादनासाठी काही आठवड्यांचा थोडासा कालावधी जरी मिळाला तरी यामुळे झाड वर्षाला इंच दोन इंच वाढत राहते.


पण अशाप्रकारे पान झडू न देणे हेसुद्धा झाडाला धोकादायक आहे.कारण फांद्यांवर बर्फ साठतो आणि वजनदार झाल्यावर झाडाची फांदी मोडू शकते.असे होऊ नये यासाठी स्प्रूस कडे दोन उपाय असतात.पहिलं म्हणजे स्त्री-पुरुष आपलं खोड सरळ सोट वाढविते.उभ्या अवस्थेत वजन समतोल राहते आणि संतुलन सहसा बिघडू शकत नाही. दुसरं म्हणजे उन्हाळ्यात फांद्या आडव्या वाढतात, आडव्या फांद्यांवर बर्फाचे वजन जमले की त्या खाली झुकू लागतात आणि खालच्या फांदीचा त्यांना आधार मिळतो.फांद्यांची रचना घराच्या कौलांसारखी होते आणि त्या एकमेकांच्या मदतीने स्वतःला सांभाळतात.या रचनेमुळे वरून पाहिल्यास हे झाड एकदम लुकडे दिसते.यामुळे बर्फ झाडाभोवती पडतो,

त्याच्यावर नाही.उंचीवर किंवा उत्तरेकडे अतिशय बर्फाळ प्रदेशात वाढणारे स्प्रूस आपल्या शिरेच्या फांद्या छोट्या ठेवत डोक्याचा मुकुट लांब निमुळता ठेवतात आणि स्वतःचा अधिक बचाव करू शकतात.


पानझड न करण्याचा अजून एक धोका असतो. सुयांसारख्या पालवीमुळे पृष्ठभाग वाढतो आणि वादळी वाऱ्याला अडथळा होतो आणि त्यामुळे हिवाळी वादळात झाड पडू शकते.एकच गोष्ट त्यांचा यापासून बचाव करते,ती म्हणजे त्यांची संथपणे होणारी वाढ.शेकडो वर्षं वयाचे झाडही जेमतेम तीस फुटापर्यंत वाढते,ज्यामुळे वादळी वाऱ्यामध्ये ते मोडण्याची शक्यता कमी राहते.तो धोका झाड साधारण ऐंशी फुटाच्या वर गेल्यावर वाढतो.


मध्य युरोपीय जंगलात बीच वृक्षांची सर्वाधिक संख्या असते.यांच्या घनदाट पालवीमुळे फार थोडा सूर्यप्रकाश जमिनीपर्यंत पोहोचतो.यू हा वृक्ष अत्यंत चिकाटीने आणि काटकसरीने वाढतो अशी त्याची ख्याती आहे.आपण बीच वृक्षाशी वाढीमध्ये स्पर्धा करू शकत नाही हे यू (भारतीय बारमी किंवा मंदुपर्णीची प्रजात) वृक्षाला चांगलेच माहिती असते.म्हणून त्याने जंगलाचा दुय्यम स्तर पकडलेला असतो.केवळ ३ टक्के सूर्यप्रकाश पोचणाऱ्या या स्तरांमध्ये 'यू'ची वाढ होते.पण या परिस्थितीत वीस ते तीस फूट उंची गाठून प्रौढ अवस्थेत पोचण्यासाठी त्याला कमीत कमी एक शतक लागते.या कालावधीत त्यावर अनेक संकटे येतात.



शाकाहारी जनावरे त्याची पालवी कुरतडून वाढ एखाद दोन दशके मागे टाकू शकतात किंवा एखादा मरणपंथाला लागलेला बीच वृक्ष त्याच्या अंगावर पडू शकतो.पण हे कणखर झाड आधीपासूनच पुरेशी सावधगिरी बाळगून तयारी सुरू करत असतो.इतर झाडांच्या मानाने अगदी सुरुवातीपासून आपली मुळे सक्षम करण्यात यू बरीच ऊर्जा खर्च करतो.मुळातून ते पोषणद्रव्यांचा साठा करून ठेवतो म्हणजे आपत्ती आलीच तर यातून परत पोषण मिळू शकते.

पण यामुळे झाडाला एकापेक्षा जास्त खोडं येऊ शकतात.प्रौढ अवस्थेत ही खोर्ड जुळून येऊ शकतात ज्यामुळे झाड थोडं विचित्र अस्ताव्यस्त दिसतं.यू चे वृक्ष इतर कोणत्याही झाडापेक्षा जास्त म्हणजे हजार वर्षापर्यंतही जगू शकतात.त्यामुळे आसपासची झाडं तुलनेने लवकर वठून पडून जातात.मग मिळणाऱ्या सूर्यप्रकाशाचा पुरेपूर वापर ते करून घेतं.असे असूनही त्यांची उंची पासष्ट फुटांपेक्षा जास्त नसते.त्यांना यापेक्षा जास्त उंच होण्यात काहीच रस नसतो.


हॉर्नबीम नावाचा वृक्ष या यू वृक्षाचे अनुसरण करायचा प्रयत्न करतो.नावात साम्य नसले तरी हे झाड बर्च वृक्षाचे नातेवाईक आहे.पण याच्या सवयी यू इतक्या काटकसरीच्या नसतात आणि त्याला जास्त सूर्यप्रकाश लागतो.तरीही ते बीच वृक्षाखाली जगू शकते पण त्याचा मोठा वृक्ष होऊ शकत नाही. 


हॉर्नबीम पासष्ट फुटांपेक्षा जास्त वाढत नाही आणि ही उंची ओकच्या जंगलात होऊ शकते कारण तिथे बीच जंगलापेक्षा जास्त सूर्यप्रकाश मिळतो.या जंगलात त्याची मोकळेपणाने वाढ होते कारण दोन्ही प्रजातींना भरपूर जागा असते.पण या जंगलातही एखादा बीच वृक्ष उगवतो आणि हॉर्नबीमना मागे टाकायला लागतो.सावली,कोरडी हवा आणि उष्णता असली तरीही हॉर्नबीम बीच झाडाशी स्पर्धा करू शकतो.अशा परिस्थितीत बीच तग धरू शकत नाहीत.ही परिस्थिती पश्चिमेकडे तोंड केलेल्या उतारावर असते आणि इथे हॉर्नबीम वृक्ष राज्य करू शकतात.दलदलीच्या प्रदेशात प्राणवायू कमी असतो आणि बहुतांश झाडांची मुळं तिथे तग धरू शकत नाहीत. अशी परिस्थिती झरे किंवा ओढे यांच्याकडेला आणि पूर पठारांवर तयार होते.समजा एखाद्या बीच वृक्षाचे बीज तिथे पडले आणि रुजले तर ते काही प्रमाणात वाढू शकते पण कुजलेल्या मुळामुळे उन्हाळी वादळात ते पडू शकते.

मुळांना भक्कम जमिनीचा आधार मिळाला नाही तर स्प्रूस,

पाईन, हॉर्नबीम आणि बर्च वृक्षांची अशीच परिस्थिती होते. पण अल्डर वृक्षांचे मात्र याच्या उलट असते. 


आपल्या स्पर्धकांपेक्षा जास्त उंच होऊ शकले नसले तरी त्यांना दलदलीच्या प्रदेशात भक्कमपणे उभं राहता येतं.

त्यांच्या मुळांमध्ये हवेच्या नलिका असतात ज्यामुळे प्राणवायू खालपर्यंत पोचू शकतो. समुद्रात पोहणाऱ्या डायव्हर्स जसे समुद्रात श्वास घेण्यासाठी 'श्वासोच्छवासाची नळी' घेऊन समुद्रात खोलवर जातात,ही नळी पाण्याच्या पृष्ठभागाबाहेर राहून त्यांना 'प्राणवायूचा पुरवठा करत राहते, त्याचप्रमाणे या हवेच्या नलिकांचे काम असते. या व्यतिरिक्त अल्डर झाडाच्या बुंदियाच्या खालच्या भागात कॉर्क पेशी (या सच्छिद्र असतात,ज्यातून हवा आत शोषली जाते) असतात. जर पाण्याची पातळी या पेशींच्या वर फार दिवस राहिली तर अल्डर वृक्षाची मुळं कुजायला लागतात.

४/३/२५

मॅनइटींग लेपर्ड ऑफ रुद्रप्रयाग - Maneating Leopard of Rudraprayag 

राजहंस प्रकाशन पुणे यांनी प्रकाशन केलेले..२०७ पानांचे 'नरभक्षकाच्या मागावर' या पुस्तकाचे मुळ लेखक केनेथ अँडरसन हे आहेत,तर या पुस्तकाचा मराठी अनुवाद लेखक संजय बापट यांनी केला आहे.(त्यांच्याशी सहजच वरील पुस्तका संदर्भात बोलत असताना) जे मूळ इंग्रजी पुस्तक त्यांनी त्यांच्या आयुष्यात ५० वर्षांपुर्वी वाचले होते.त्यांनी ते पुस्तक मला आवर्जून वाचण्यास सांगितले होते.ते पुस्तक म्हणजेच मॅनइटींग लेपर्ड ऑफ रुद्रप्रयाग मूळ लेखक - जिम कॉर्बेट,अनुवाद - विश्वास भावे) 


...दिसेना. परत मचाणापर्यंत उतरून मी आडव्या पसरलेल्या फांद्याच्या टोकापर्यंत गेलो पण तिथून सुद्धा बिबळ्या गेल्याच्या दिशेला काहीच दिसत नव्हतं. यावेळी तीन वाजले होते.दोन तासानंतर चंद्रप्रकाश फिका होऊ लागला व जवळच्या वस्तू अस्पष्ट दिसू लागल्या तसा मी झाडावरून उतरलो.बोकडाने माझं बें बें करून स्वागत केलं.बोकडाच्या पलीकडे रस्त्याच्या कडेला एक बसका लांबुळका खडक होता व 


त्यावर इंचभर जाडीचा रक्ताचा माग होता.अशाप्रकारे रक्त अंगातून गेल्यावर कोणताही बिबळ्या दोन मिनिटांच्या वर जगू शकत नाही.

त्यामुळे शिकारी प्राण्यांच्या मागावर जाताना घेतल्या जाणाऱ्या कोणत्याही खबरदाऱ्या मुळीच न घेता मी रस्त्यावरून खाली उतरलो आणि खडकापलीकडे रक्ताचा माग काढायला सुरूवात केली.तसाच पुढे पन्नास यार्ड माग काढल्यावर मला तो बिबळ्या मरून पडलेला दिसला. जमीनीवरच्या एका उथळ खळग्यात मागे घसरून तो पडला होता व त्याची हनुवटी खळग्याच्या कडेवरती स्थिर झाली होती.


हा नरभक्षकच आहे हे ओळखण्यासाठी कोणतीच खूण समोर दिसत नव्हती तरी यावेळी क्षणभरसुद्धा मला शंका नव्हती ! पण इथे तर कोणताही सैतान,भूत किंवा दुष्टात्मा नव्हता.माझी सर्व धडपड लपून बघत,सैतानी हास्य करत मी केव्हा बेसावध राहतोय याची वाट पहात जिभल्या चाटणारं दृष्ट जनावर नव्हतं... इथे एक साधा वयस्क बिबळ्या होता... इतर जातभाईपेक्षा थोडे फार फरक असलेला ! त्याच्या मानेवरचे केस राखाडी झाले होते,मिशा नव्हत्याच.सर्वांकडून भीती व तिरस्काराला पात्र झालेल्या ह्या जनावराचा एकच गुन्हा होता, निसर्गाच्या दृष्टीने फारसा नव्हे तर माणसाच्या दृष्टीकोनातून कारण त्याने माणसाचं रक्त वाहवलं होतं. पण ते माणसावर वर्चस्व गाजवण्यासाठी किंवा त्याला दहशतीखाली ठेवण्यासाठी नव्हे तर जगण्यासाठी, स्वतःच्या अस्तित्वासाठी आणि आत्ता तो हनुवटी जमीनीला लावून चिरनिद्रा घेत होता ! ज्या रायफलच्या एका बुलेटमुळे माझे व त्या बिबळ्यामधले आजपर्यंतचे सर्व हिशेब चुकते झाले होते त्या रायफलमधल्या उरलेल्या बुलेट्स मी काढून ठेवत होतो. 


तेवढ्यात मला खोकल्याचा आवाज आला.वर पाहिलं तर रस्त्याच्या कडेवरून वाकून पाहणरा पंडित दिसला.मी त्याला खुणेनेच बोलावलं तसा तोही लगबगीने खाली आला पण त्याला बिबळ्याचं डोकं दिसताच तो जागीच थबकला आणि मला अगदी दबक्या आवाजात विचारलं की तो मेलाय का? व ते काय आहे? तो मेला आहे व पाच वर्षापूर्वी त्याचा गळा धरणारा तोच सैतान आहे असं उत्तर दिल्यावर त्याने हात जोडले व माझ्या पायावर डोकं ठेवण्याचा प्रयत्न केला.तेवढ्यात रस्त्यावरून "साहेब,तुम्ही कुठे आहात?" अशी हाक आली.आमच्याच एका माणसाचा आवाज होता.मी जेव्हा 'ओ-दिली तेव्हा रस्त्यावर चार डोकी उगवली आणि आम्हाला पाहातच घाईघाईने डोंगर उतरून आली.त्यातल्या एकाच्या हातात पेटलेला कंदील होता... तो विझवायला विसरला होता.


त्या खळग्यात बिबळ्याचं अंग ताठ झालं होतं त्यामुळे तिथून त्याला बाहेर काढताना बरीच खटपट करावी लागली.आमच्या माणसांनी येताना बांबूही आणले होते आणि त्या बांबूला आम्ही बिबळ्याचं धूड बांधताना माणसं म्हणाली की रात्री त्यांना झोप लागली नव्हती. बंगल्याच्या जमादाराच्या घड्याळात ४.३० वाजलेले पहाताच त्यांनी कंदील पेटवला आणि बांबू व दोऱ्या घेऊन ते मला भेटायला निघाले.त्यांना वाटलं होतं की मला काहीतरी मदतीची गरज आहे.पण इथे मचाणावरही मी नाही,

बोकडही सुरक्षित आहे हे पाहिल्यावर त्यांना वाटलं की बिबळ्याने माझाही बळी घेतलाय व आता पुढे काय करायचं हे न कळल्याने त्यांनी मला हाका मारल्या होत्या.माझा रग मचाणावरून आणण्यासाठी व काल रात्रीची घटना यात्रेकरूंना तिखटमीठ लावून सांगण्यासाठी पंडितला तिथेच ठेवून मी,ती चार माणसं व दुडक्या चालीने चालणारा तो बोकड असे सर्वजण आम्ही बंगल्याकडे निघालो. बिबळ्याने ज्या क्षणी झडप मारली त्या क्षणीच त्याला माझी गोळी लागल्याने तो बोकड छोट्या जखमेनिशी बचावला होता.त्याला आता जाणीवही नव्हती की त्याच्या काल रात्रीच्या साहसामुळे तो उर्वरित आयुष्य एखाद्या 'हिरो' सारखं जगणार आहे त्याला एक सुंदर पितळी कॉलर बक्षीस मिळणार आहे आणि त्याच्या मालकासाठी तो एक उत्पन्नाचं साधन बनणार आहे.


मी दरवाजा खटखटवला तेव्हा इबॉटसन झोपला होता. काचेतून मला पाहताच तो बेडवरून उडी मारून उठला व दरवाजा उघडला.त्याने मला आनंदाने मिठीच भारली आणि दुसऱ्या मिनिटाला व्हरांड्यावर ठेवलेल्या बिबळ्याच्या धूडाभोवती नाचायला लागला.जोरजोरात ओरडून त्याने माझ्यासाठी चहा व गरम पाणी काढायच्या ऑर्डर्स दिल्या,स्टेनोग्राफरला बोलावलं, आणि शासन,प्रसारमाध्यमं,जीन व माझी बहीण यांच्यासाठीच्या टेलिग्रामच डिक्टेशन देऊ लागला.


त्याने मला अक्षरशः एकही प्रश्न विचारला नाही.त्याला माहीत होतं की इतक्या सकाळी मी इथे आणलेला तो बिबळ्या नरभक्षकच होता.मग प्रश्नांची गरजच काय होती?मागच्या वेळेला सर्व पुरावे समोर दिसत असूनही मी ठाम राहिलो होतो की आम्ही जिनटॅपमध्ये मारलेला बिबळ्या नरभक्षक नाही आणि यावेळी मी काहीच बोललो नव्हतो !


मागच्या वर्षीच्या ऑक्टोबर महिन्यापासून त्याच्या खांद्यावर फारच मोठी जवाबदारी येऊन पडली होती. मतदारांना खूष ठेवायला बघणाऱ्या राजकारणी लोकांना,दररोजच्या वाढत्या नरबळींमुळे दबाव आलेल्या सरकारी अधिकाऱ्यांना,वरिष्ठांना आणि प्रसारमाध्यमांना त्यालाच तोंड द्यावं लागत होत.एखादा गुन्हेगार माहीत आहे पण तो गुन्हे मात्र थाबवू शकत नाही आणि त्यामुळे सगळीकडून थपडा खाव्या लागणाऱ्या पोलीस ऑफिसरसारखी त्याची अवस्था झाली होती.त्यामुळे २ मे १९२६ रोजी इबॉटसन हा जगातला सर्वात आनंदी माणूस होता यात नवल नव्हतं ! आता तो सर्वांना छाती ठोकून सांगू शकणार होता की त्या नरभक्षकाचा आता खातमा झालाय. त्याचप्रमाणे आसपासच्या गावातल्या लोकांना, यात्रेकरूंना,बंगल्याच्या कंपाऊंडमध्ये हळूहळू जमणाऱ्या लोकांना तो सांगू शकणार होता की त्यांना सतत आठ वर्ष छळणारी 'सैतानी शक्ती' आता नष्ट झाली आहे.चहाचं भांडं रिकामं केल्यावर आणि गरम पाण्याने आंघोळ केल्यावर मी थोडा झोपायचा प्रयत्न केला,पण नाही! माझ्या पायाला पेटके आले होते व पाय मुरगळल्यासारखा झाला होता.केवळ इबॉटसनने केलेल्या मसाजमुळेच जरा बरं वाटतं होतं.तसे पेटके परत येतील या भीतीने मी झोपू शकलो नाही.


शेवटी मी उठलो आणि आम्ही दोघांनी बिबळ्याची मोजमापं घेतली,काळजीपूर्वक निरीक्षण केलं. ही निरीक्षणं खाली देत आहे.


मापं…


लांबी : बिटवीन द पेग्ज -  ७ फूट ६ इंच


लांबी : ओव्हर द कर्व्हज - ७ फूट १० इंच


(बिबळ्या मेल्यानंतर १२ तासांनी ही मापं घेतली आहेत.)


निरीक्षणे


रंग: फिक्कट गवती


केस : आखूड व गळणारे


मिशा : नाहीत


जीभ व तोंड : काळा रंग


जखमा : उजव्या खांद्यावर ताजी बुलेटची जखम


मागच्या डाव्या पंजाला जुन्या रायफलच्या गोळीने झालेली जखम व एक चवडा व नख गायब.


डोळ्यावर बऱ्याच खोल पण अर्धवट भरलेल्या जखमा


शेपटीवर बऱ्याच पण अर्धवट भरलेल्या जखमा


मागच्या डाव्या पायाच्या स्टीफलवर एक छोटीशी जखम.


तोडांच्या व जिभेच्या काळ्या रंगाबाबत मी काही स्पष्टीकरण देऊ शकत नाही,कदाचित सायनाईडमुळे पण तसं झालं असावं असं काहींचं म्हणणं आहे. अर्धवट भरलेल्या जखमांपैकी डोकं,उजवा मागचा पाय आणि शेपटीला झालेल्या जखमा त्याच्या भैंसवाड्याला झालेल्या लढाईत झाल्या होत्या.डाव्या मागच्या पायाच्या स्टीफलला झालेली जखम जिनट्रॅपमध्ये अडकल्यामुळे झाली होती,कारण ट्रॅपमध्ये सापडलेला कातडीचा तुकडा व केस यात चपखल बसले.मागच्या डाव्या पायाची जखम १९२१ मध्ये त्या तरूण आर्मी ऑफिसरने ब्रिजवरून झाडलेल्या गोळीमुळे झाली होती.बिबळ्याची कातडी काढताना मला बंदुकीचा एक छर्रा त्याच्या छातीजवळच्या कातडीत अडकलेला मिळाला.जवळ जवळ वर्षभरानंतर एका भारतीय ख्रिश्चन माणसाने तो छर्रा ज्यावर्षी बिबळ्या नरभक्षक झाला त्या वर्षी त्याने मारलेल्या गोळीतला आहे हे कबूल केलं.ही सर्व मोजमापं व निरीक्षण झाल्यावर त्याचं धूड एका झाडाच्या सावलीत ठेवण्यात आलं आणि संपूर्ण दिवसभर हजारो माणसं,बायका व मुलं त्याला बघायला येत राहिली.जेव्हा आमच्या भागातली पहाडी लोकं एखाद्याला काही विशिष्ट उद्देशाने भेटतात उदा.आभार मानण्यासाठी वगैरे,तेव्हा या मोहिमेवर रिकाम्या हाताने जाऊ नये असा रिवाज पाळला जातो.


एखादं गुलाबाचं,चमेलीचं फूल किंवा पाकळ्या पुरेशा असतात व हाताची ओंजळ करून ही भेट दिली जाते. भेट स्वीकारणाऱ्याने उजव्या हाताच्या बोटांचा स्पर्श त्या वस्तूला केला की देणारा माणूस ओंजळ सोडून घेणाऱ्याच्या पायावर ती फुलं टाकतो,जसं ओंजळीने पाणी टाकावं तसं !


मी इतरही अनेक प्रसंगात असे आभार स्वीकारले आहेत.पण त्या दिवशी रुद्रप्रयागमध्ये मात्र प्रथम बंगल्यावर आणि नंतर बाजारात भरलेला सोहळा केवळ अविस्मरणीय होता.


"त्याने माझ्या एकुलत्या एका पोराला मारलंय साहेब आणि आता म्हातारपणी आम्हाला कोणी नाही."


"माझ्या पाच पोरांच्या आईचा त्याने बळी घेतला,सर्वांत धाकटा तर फक्त काही महिन्यांचा आहे.आता पोरांचा सांभाळ करायला,जेवण करायला घरात कोणी नाही."


"माझा पोरगा रात्री खूप आजारी पडला पण रात्री दवाखान्यात जायची कोणाचीच छाती झाली नाही आणि त्यातच तो दगावला."


एकापेक्षा एक शोकांतिका... पण ते दुःस्वप्न आता संपलं होतं. आणि त्या ऐकत असताना माझ्या पायावर फुलांचा व पाकळ्यांचा सडा पडत होता !


भरतवाक्य…


या पुस्तकात मी सांगितलेली गोष्ट १९२५ ते १९२६ या काळातली आहे.त्यानंतर १९ वर्षांनी म्हणजे १९४२ साली मी मीरत येथे युद्धासंदर्भातल्या कामात होतो. मला आणि माझ्या बहिणीला एक दिवस जखमी सैनिकांची करमणूक करण्यासाठी कर्नल फ्लायनी एका गार्डन पार्टीला येण्याचं निमंत्रण दिलं.


भारताच्या सर्व भागातून आलेली पन्नास-साठ माणसं एका टेनिस कोर्टवर नुकताच चहा संपवून बसली होती आणि आता जरा हास्यविनोदाच्या व धूम्रपानाच्या मूडमध्ये होती.अशातच आम्ही पोचलो आणि कोर्टाच्या पलीकडच्या बाजूने मी व माझ्या बहिणीने बाहेरच्या रांगेतून हळूहळू फिरायला सुरुवात केली.


सर्वच लोक मध्यपूर्वेकडचे होते आणि थोडी विश्रांती घेऊन त्यांच्या त्यांच्या घरी जाणार होते;काहीजण रजेवर तर काही डिस्चार्जवर.

फ्लायमॅडमने भारतीय संगीताच्या रेकॉर्ड ग्रामोफोनवर वाजवण्याची व्यवस्था केली होती. पार्टी संपेपर्यंत आम्ही दोघांनी तिथे रहावं अशी त्यांनी विनंती केल्याने आम्हाला जखमी सैनिकांशी बोलायला बराच वेळ उपलब्ध होता.


फिरत फिरत आम्ही एक अर्धवर्तुळ पूर्ण केलं असेल तसा आम्हाला एक पोरगेलेसा सैनिक छोट्या खुर्चीवर बसलेला दिसला.तो जबर जखमी झाला होता.त्याच्या खुर्चीशेजारी दोन कुबड्याही होत्या.मी जवळ आल्यावर तो मोठ्या कष्टाने खुर्चीवरून उठला आणि माझ्या पायावर डोकं ठेवण्याचा प्रयत्न करू लागला.बरेच दिवस हॉस्पिटलमध्ये काढल्याने त्याचं वजन बरंच घटलं होतं.मी त्याला उचलून परत खुर्चीवर ठेवलं तेव्हा तो म्हणाला,"मी मघाशी तुमच्या बहिणीशी बोलत होतो आणि जेव्हा मी त्यांना मी गढवाली आहे असं सांगितलं तेव्हा त्यांनी मला तुम्ही कोण आहात हे सांगितलं."तुम्ही त्या बिबळ्याला मारलेंत तेव्हा मी खूप छोटा होतो.माझं गाव रुद्रप्रयागपासून बरंच दूर दूर होतं.

मलाही त्यादिवशी रुद्रप्रयागला यायचं होतं.पण मी इतकं अंतर चालू शकणार नव्हतो.माझे वडील मला खांद्यावरून घेऊन जाऊ शकतील इतके ताकदवान नव्हते.घरी परतल्यावर त्यांनी मला सांगितलं की त्यांनी बिबळ्याला बघितलं आणि त्याला ज्या साहेबाने मारलं त्याला स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं.त्या दिवशी सर्वांना मिठाई वाटण्यात आली होती आणि त्यांच्या वाट्याची मिठाई त्यांनी माझ्यासाठी आणली होती.


आता मीही घरी जाऊन सांगू शकेन की मी माझ्या डोळ्यांनी तुम्हाला पाहिलंय ! दरवर्षी रुद्रप्रगाला नरभक्षकाचा मृत्यू साजरा करण्यासाठी मोठी जत्रा भरते.त्या जागेवर मला घेऊन जाणारा कोणी भेटला तर मी सर्वांना सांगेन की तुम्ही मला भेटलात !


असा आहे आमचा गढवाली माणूस ! हा मुलगा ऐन जवानीच्या उंबरठ्यावरचा होता आणि एक युद्ध गाजवून जखमी होऊन आला होता.पण स्वतःच्या शौर्याच्या कथा सांगण्याऐवजी १९ वर्षापूर्वी रुद्रप्रयागच्या एका बिबळ्याला मारणाऱ्या माणसाला त्याने पाहिलंय एवढंच तो त्याच्या बापाला व इतर सर्वांना सांगणार होता.


१२.०२.२५ या लेखातील शेवटचा भाग..।


'रुद्रप्रयागचा नरभक्षक बिबळ्या' या लेखापासून व ०९.०७.२३ या तारखेपासून आपण हे पुस्तकच क्रमशः प्रकाशित करीत आलेलो आहोत.दोन मोकळ्या पानासहीत १६० पानांचे हे पुस्तक आज संपले.'अंधारातील नेम' या लेखातील हा तिसरा व पुस्तकातील शेवटचा भाग .. या बद्दल आपणा सर्वांचे मनापासून आभार…- विजय गायकवाड..!!



२/३/२५

खारट पोहे / Salty swim २

"हो रे, लंचसाठी डबापण देणार होती;पण मीच म्हटलं,

सकाळी पाच वाजता उठून बनवणार त्यापेक्षा आज दुपारी बाहेर जातो जेवायला."


"आज बाहेरच जावं लागणार आहे.मीपण आणला नाही डबा.चल बॉस यायच्या आधी उरकून घेऊ." असं म्हणत अनिरुद्ध उठला.


आज अनिरुद्धला डबा द्यायचाच आहे,तर फक्त चपाती-भाजी न देता आमटी-भात आणि सॅलडपण करू म्हणून राधिकानं सगळा स्वयंपाक आवरला. जायच्या आधी फोन करून सांगूया,नाही तर तो बाहेर जाईल म्हणून राधिकानं फोन केला.पूर्ण रिंग वाजली;पण अनिरुद्धनं फोन काही उचलला नाही. मीटिंग सुरू असेल म्हणून डबा भरून पार्किंगमध्ये आल्यावर परत फोन केला.त्यावेळीपण त्यानं फोन उचलला नाही.अजून राग कमी झाला नसणार. म्हणजे डबा घेऊन गेलं तर तिथंच ओरडणार तर नाही ना? राधिकानं दोन मिनिटं विचार केला आणि जायचं ठरवलं.ओरडला तर ओरडला.पुढचं पुढं बघू, म्हणत तिनं स्कुटी बाहेर काढली.

बरेच दिवस न वापरल्यानं गाडी चालूच होत नव्हती.किका मारून मारून पाय भरून आलं;पण गाडी काही चालू झाली नाही.जरा गुड गुड केली की बंद व्हायची. तेलाची टाकी उघडून बघितली तर त्यात खडखडाट. मग तिनं गाडी साईड स्टँडला लावली आणि कॉर्नरवरच्या पेट्रोल पंपावर जाऊन बाटलीतून पेट्रोल आणलं.इतक्या मेहनतीनं चाललीय खरी; पण हा बाबा बाहेर गेला नसला म्हणजे बरं. सकाळी सासूबाईंनी मुलगी झाली म्हणून बोललेलं शब्द कानात घुमत होतं.पोह्यात मीठ नीट मिक्स झालं नाही म्हणून पोहे अंगावर फेकून दिलं.इतका पुरुषी अहंकार.नोकरी करणारी बायको पाहिजे आणि लग्न झालं की मुलं सांभाळून,घर, स्वयंपाक, सासू-सासरे, पैपाहुणे यांची सरबराई करून नोकरी सांभाळा म्हणे; बाई आहे की मशीन ? स्वतःच स्वतःशी पुटपुटत तिनं गाडीच्या टाकीमध्ये पेट्रोल घातलं आणि गाडी सुरू केली.

दोन-तीन किका मारताच गाडी चालू झाली आणि तिनं समाधानाचा सुस्कार सोडला.इतक्या दिवसांनी गाडीवरून जाताना लागणारा वारा राधिकाच्या गालाला गुदगुल्या करू लागला.हेल्मेटची काच वर करून ती वाऱ्याचा आनंद घेत निघाली.


दुपारी लंचला बाहेर जायचा अनिरुद्धचा बेत आधीच ठरला होता.हॉटेलला जाऊन ऑर्डर करून जेवण मिळायला उशीर होईल म्हणून फोन करून टेबल बुक केलं आणि ऑर्डर दिली होती.संदेशच्या कारमधून दोघं ऑफिसमधून बाहेर पडले.


चौकात सिग्नलला चांगलीच गर्दी होती. हळूहळू वाट काढत संदेश पुढं सरकला.उजवीकड वळण बंद केलं होत.परत पुढच्या चौकातून यू टर्न घ्यावा लागणार म्हणून अनिरुद्ध वैतागला."अरे ट्रॅफिक म्हणजे ना डोक्याला ताप आहे.अस अचानक डायव्हर्ट करतात.आधी माहिती असतं तर पढ आलोच नसतो." "चिल यार.. काहीतरी कारण असणार नाही तर उगाच कशाला डायव्हर करतील;पण तू सकाळपासून इतका चिडचिड का करत आहेस?"


"अरे,काल एकतर बॉसनं उशिरापर्यंत डोकं फिरवलं.त्यात रात्री आमटीत मीठ कमी,तर सकाळी राधानं पोहे खारट केलेलं.डबापण तयार नव्हता."


"तू रात्री वहिनींना सांगितलं नव्हतंस का लवकर डबा बनव म्हणून?"


"नाही ना यार.बॉसच्या टेन्शनमध्ये विसरलो सांगायला."


"मग तू ऑफिसचा राग बायकोवर का काढतोस?"


"अरे पण स्वयंपाक नीट नको का बनवायला?"


"तू जसं सांगायला विसरलास तसं ती मीठ टाकायला विसरली असेल.त्यात इतकं काय चिडण्यासारखं आहे? घ्यायचं आमटीत थोडं मीठ वरून..."


"घरात बसून तिला तेवढंच काम आहे; तेपण नीट करता येत नाही. नोकरी सोडून घरी बसलीय, तर घर तरी सांभाळता आलं पाहिजे."


"त्यांनी का नोकरी सोडली?"


"बाळाला कोण सांभाळणार?"


"तुझी आई असते ना घरी ?"


"ती थकलीय आता.तिच्यानं नाही होत पळापळ."


"ऑफिसचं टेन्शन आणि बायकोची नोकरी याचा राग राधिका वहिनींवर काढून कशाला त्रास करून घ्यायचा?"


"आता तू तिची वकिली करू नकोस.बघ लवकर मरणार नाही ती.विषय काढला आणि तिचा फोन आला.आता पकवणार.आईबरोबर वाद झाला असणार,नाही तर घरी काहीतरी संपलं असणार?"


"तुला सगळं माहीत आहे रे?"


"म्हणूनच फोन कट केला;पण तिचा आत्मा शांत होतोय का बघ,दोन वेळा कट केला तरी तिसऱ्यांदा लावला. आता पूर्ण रिंग होऊदे.बसूदे कानाला फोन लावून."


बघ तर काय म्हणायचं आहे ते.दोन मिनिटंच लागतील,किती वेळा अस टाळणार?"


"बघ ना. कळत कसं नाही या लोकांना समोरचा माणूस फोन उचलत नाही णजे काहीतरी कामात असेल,बीझी असेल.

यांना मॅनर्सच नाहीत..." असं म्हणत अनिरुद्धनं रागानं फोन कट केला.


" तुझ्या बाजून तू बरोबर आहेस रे,पण असंही असेल की,

समोरची व्यक्ती काहीतरी अडचणीत असेल.इमर्जन्सी असेल.बघ तरी काय म्हणायचं आहे त्यांना..." संदेश हसत हसत बोलला.


"ठिक आहे,तू म्हणतोस म्हणून उचलतो." येऊदे परत म्हणत अनिरुद्धनं फोन हातातच धरला;पण फोन आला नाही.थोडा वेळ वाट बघून फोन खिशात ठेवला.रिलॅक्स होत केसातून हात फिरविला.दोन मिनिटांनी परत फोन वाजला."बघ इतका वेळ फोन हातात होता तोवर वाजला नाही.जरा डोळा लागला तर फोन आला.ही बया पाठ सोडणार नाही आणि सुखात जगू देणार नाही." असं म्हणत अनिरुद्ध मिश्कीलपणं हसला.


"उचल फोन आणि विषय संपव.बघ काय काम आहे."


रागानं फोन उचलून अनिरुद्ध खेकसला,"इतक्या वेळा फोन करायला काय झालंय.घरी येईपर्यंत वाट बघता येत नाही का? जीव जातोय का?"


समोरून आवाज आला, "जीव जात नाही.जीव गेलाय..!"


"काय..?" राधिकाच्या फोनवर अनोळखी आवाज ऐकून अनिरुद्ध घाबरला.


✓ "ज्या नंबरवरून तुम्हाला फोन आलाय त्या व्यक्तीचा आताच अपघात झालाय.त्यांच्या फोनवर तुमचा नंबर लास्ट डाईलमध्ये आहे आणि हब्बी नावानं सेव्ह आहे म्हणून तुम्हाला फोन केला. समोरून निर्विकार आवाज आला.

बोलणं ऐकून संदेशनं गाडी बाजूला थांबवली.


घाबरलेल्या अनिरुद्धनं विचारलं,"कधी? कुठे? कसा? ती तर घरीच असते!"


"पंधरा मिनिटे झाली.चौकात सिटी बसला स्कुटी धडकली.

सोबत जेवणाचा डबा आहे.चौकात या.ओळख पटवून बघा.बराच वेळ अनि,अनि म्हणून तळमळत होती;पण तुम्ही फोन उचलला नाही. तोवर जीव सोडला."


२८.०२.२५ या लेखातील शेवटचा भाग…


२८/२/२५

खारट पोहे / Salty swim

अंघोळ आटोपून अनिरुद्ध घाईघाईतच बाहेर आला.

गुंडाळलेला टॉवेल बेडवर फेकत बायकोला आवाज दिला, "राधा,माझा टिफीन लवकर भर. मला आज लवकर जायचं आहे ऑफिसला."


"अरे,तू लवकर जाणार आहेस, शहे आधी का सांगितलं नाहीस?" भांबावलेल्या राधिकानं विचारलं.


"सगळ्या गोष्टी मी तुला विचारूनच केल्या पाहिजेत का?" असं तावातावानं म्हणतच त्यानं कपडे घातले.


"अरे, म्हणजे मी स्वयंपाकाला लवकर सुरुवात केली असती ना. तू हा नाष्टा घे,तोवर मी लगेच दोन चपाती लाटते.भाजी फोडणी टाकलीच आहे.तुझा चहा पिऊन होईपर्यंत टिफीन तयार करते," असं म्हणत राधिकानं हातातली पोह्याची प्लेट टेबलवर ठेवली आणि एक प्लेट सासूबाईंच्या हातात दिली. आपली प्लेट मात्र झाकून ठेवली.


शेगडीवर एका बाजूला चपातीसाठी तवा ठेवला. दुसऱ्या बर्नरवर अगोदरच भाजीची कढई होती. कणकीला हात लावण्यापूर्वी मीठ टाकायला भाजीवरचं झाकण काढलं,तर तिच्या दोन्ही बोटांना चटका बसला. तोवर अनिरुद्धची हाक आली, "माझा रुमाल कुठं आहे?"


"कपाटात आहे ब्ल्यू पँटच्या शेजारी..." राधिकानं किचनमधूनच सांगितलं.टाय सावरत अनिरुद्ध टेबलजवळ आला.खांद्याला अडकविलेली लॅपटॉपची बॅग शेजारच्या खुर्चीवर ठेवली.हातातला सॉक्स पायात चढवत पुटपुटला "काल रात्री उशिरापर्यंत मीटिंग घेऊनपण आज लवकर बोलवलंय.ह्या सायबालापण ना.मुद्दाम मलाच असं करतो..."


"काय झालंय इतकी चिडचिड करायला?" समोर बसलेल्या आईनं पोहे खात खात विचारलं.


"काही नाही गं.एका प्रोजेक्टची डेडलाईन संपत आलीय;पण काम खूप शिल्लक आहे.काल बॉस इतका वेळ बडबडत होता ना,वाटलं त्याच्या तोंडावर राजीनामा फेकून मारावा;पण घराचा आणि गाडीचा हप्ता चालू आहे तोपर्यंत नो रिस्क ! हा प्रोजेक्ट जर वेळेवर पूर्ण झाला तर प्रमोशन होईल. जरा पगार वाढला की कार बदलावी म्हणतोय."


"होईल रे बाबा प्रमोशन.मी देवाला साकडं घातलंय, तू बघच..." आईनं आश्वस्त केलं.


"अगं आई,पण तो रोहन टपलाय ना माझ्या वाईटावर.सारखा बॉसकडं कागाळ्या करत असतो." असं म्हणत अनिरुद्धनं पोह्याची प्लेट उचलली.पहिला घास तोंडात घातला.दोन वेळा चघळून थू.. थू करीत राधिकाकडं बघत किचनमध्येच धुंकला. "बावळटा,पोह्यात मिठाची चिमूट घातलीय का आख्खा डबा ओतलाय.रात्री आमटीत मीठच नव्हतं,तर आता पोहे खारट करून ठेवलंस.तुझ्या आई-बापानं कधी तुला स्वयंपाक करायला शिकवला नाही का..?"


अनिरुद्धच्या संतापानं अधिकच गोंधळलेली राधिका म्हणाली, "अरे पण मी थोडंसंच घातलेलं."


"मग तूच खा ते..." असे म्हणून अनिरुद्धनं उरलेलं पोहे राधिकाच्या अंगावर फेकून दिलं आणि बॅग घेऊन पाय आपटतंच बाहेर निघाला.


"अरे आणि,डबा तर घेऊन जा..." एका हातात डबा आणि दुसऱ्या हातानं डोळ्यांवर आलेलं केस नीट करीत ती अनिरुद्धच्या मागून पळतच आली.


"तूच खा तुझं बेचव जेवण..." असं म्हणत अनिरुद्धनं दरवाजा खाडकन् ओढून घेतला.


आई शांतपणे बसून सगळा तमाशा बघत होत्या.


"आई,खरंच पोहे खारट झालेत का हो? तुम्ही खाल्ले ना..." रडवेल्या सुरातच राधिकानं विचारलं.


"पोहे नीट भिजवायला येत नाहीत का तुला? एखाद्या घासात मिठाचा खडा तसाच राहिला असणार.एवढ शिकून काय उपयोग.साधे पोहे करता येत नाहीत.गेलं ना माझं लेकरू उपाशी...' आईनं टोमणा मारला.


एवढ्या आपुलकीनं आणि कष्टानं हे सारं करूनही दोघांनीही तिला फटकारून बोललेलं सहन न झालेली अनिता संतापली आणि म्हणाली,"माझ्या आई-वडिलांनी मला इंजिनिअर केलं होतं.पोहे करायच्या कोर्सला पाठवलं नव्हतं.तुमची लेक तर किचनमध्ये पायच ठेवत नाही.तिला स्वयंपाक शिकवायला काय झालं होतं?"


"तिच्या घरी स्वयंपाकाला बाई आहे आणि माझी लेक नोकरी करते."


वाघीण-प्रतिक पाटील-स्वच्छंद प्रकाशन कोल्हापूर


"मीपण नोकरी करीत होते.तुम्ही बाळाला सांभाळत नाही म्हणून मला घरी बसावं लागलं."


"पोरं संभाळायला होत नाहीत,तर जन्माला कशाला घालायची..?"


"तुम्हालाच हवा होता ना वंशाला दिवा !"


"मग झाला का? मुलगा हवा होता आम्हाला."


"अच्छा म्हणजे मुलगी झाली म्हणून तुम्ही असं वागताय;पण यात माझी काय चूक आहे?"


"जी चूक झाली आहे ती आधी निस्तर.माझा मुलगा उपाशीपोटी गेलाय,त्याला आधी डबा देऊन ये." सासूनं ठेक्यात सांगून नाक मुरडलं आणि पदर खांद्यावर सावरत निवांत बसून उरलेलं पोहे खायला सुरुवात केली.


सासूकडं रागानं बघत कोपरापासून हात जोडलं आणि ती ताडकन् किचनमध्ये गेली.


करपलेली चपाती तव्यातून बाहेर काढून गॅस बंद केला.किचनभर पडलेले पोहे तिनं गोळा केलं आणि ती अंघोळीला गेली.अंघोळ झाल्या झाल्या लगेच स्वयंपाकाला सुरुवात केली.


अनिरुद्धनं वाटेत टपरीवरच इडली सांबार खाल्लं आणि ऑफिस गाठलं.तरीही त्याला पोहोचायला दहा मिनिटे उशीर झाला.बॉस अजून यायचा होता.


अनिरुद्धचा खास दोस्त आणि कलिग संदेश पाठीमागून आला आणि,"अन्या चल नाष्टा करूया. सकाळी लवकर येण्याच्या नादात घरी काही खाल्लं नाही.मग सोबत बायकोनं डबा दिलाय.चल खाऊया थोडं थोडं."


"नशीबवान आहेस रे तू.. किती काळजी घेतात वहिनी!" 


घरोघरी मातीच्या चुली ही म्हण शाळेमध्ये असताना तोंडपाठ केलेली असायची,कारण म्हणी व त्याचा अर्थ सांगा असा प्रश्न असायचा.पेपरमध्ये उत्तर दिले.त्याचा गुण मिळाला..पण आज ही गोष्ट वाचल्यानंतर त्याचा खरा अर्थ कळाला.आपण ही गोष्ट आवर्जून वाचावी…विजय गायकवाड


उर्वरित शिल्लक भाग पुढील लेखामध्ये..।



२६/२/२५

हसरा,एपिक्यूरस / Smile,Epicurus

…..असले तरी त्यांना या सृष्टीशी काही एक कर्तव्य नाही.त्यांना या आपल्या मर्त्य जगातील घडामोडींचे सोहेर,सुतक,काहीही नाही! हे जीवन म्हणजे एक मूर्खाचा बाजार आहे.दैवी मेंदूतून असल्या जगाची कल्पना निघणे शक्य नाही.कोणताही देव स्वतःच्या पूजेसाठी मंदिर बांधावयाला सांगून ते आपल्याच विजेच्या लोळाने भस्म करणार नाही.देव असा कसा असू शकेल? दयाळू देव एखाद्या मुलाला आजारातून बरा करून पुन्हा लढाईत मरावयाला पाठवील,हे कसे शक्य आहे? एपिक्यूरसच्या मते या अकस्मात उत्पन्न झालेल्या जगात देव व मानव दोघेही भयभीतपणे वावरत असतात.हे जग देवांनी निर्मिले नाही, मानवांनीही निर्मिले नाही,दोघेही या जगात अपरिचित पाहुणे आहेत.त्यांना सदैव धास्ती वाटते.देवांना स्वतःचीच काळजी वाहावी लागते,चिंता लागलेली असते.माणसांनी देवांच्या नावाने हाका मारण्यात काय अर्थ ? जगात चालेल्या झगड्यांमध्ये देवही माणसा प्रमाणेच निराधार आहेत.हे जग दुसऱ्या कोणी निर्मिलेले नसून अणूंच्या आकस्मिक संघांतातून आपोआप बनलेले आहे.ते स्वयंभू आहे.पण मग अणूंच्या संघांतातून बनलेल्या या जगात फुले-फळे,

पशु-पक्षी, देव-मानव, इत्यादी विविध प्रकार कसे झाले? या अणूंतून कोणत्या प्रक्रियेने व बनावाने डॅमॉक्रिटससारखे शास्त्रज्ञ व एपिक्यूरससारखे तत्त्वज्ञ जन्मले ? एपिक्यूरस म्हणतो, " प्रसंगाने,नाना चुका होत होत,नाना प्रक्रिया होत होत,हे सर्व झाले." हे अणू उत्तरोत्तर अधिकाधिक शुद्धतेकडे जात असतात त्यांचा उत्तरोत्तर विकास होत असतो.ओबडधोबड आकारांतून सुंदर आकारांकडे वस्तू जात असून जे अयोग्य आहे ते दूर,नष्ट होत असते,गळून जात असते व योग्य असेल ते कायम होत असते,थोडक्यात सांगावयाचे म्हणजे,या निरनिराळ्या वस्तू उत्क्रांतीच्या योगाने बनत आल्या आहेत.


डार्विनपूर्वी बावीसशे वर्षे इतक्या प्राचीन काळी एपिक्यूरसने उत्क्रांतीचे तत्त्व मांडले आहे.


एपिक्यूरियन मीमांसेनुसार;मनुष्य कसा जन्मला, निरनिराळ्या प्रजाती कशा जन्मल्या,याचे मोठे सुंदर वर्णन ल्युक्रेशियसने दिले आहे.अनंत काळापासून फिरणाऱ्या अणुपरमाणूंतून पुष्कळशा घटना व विघटना होत होत शेवटी त्यांतून एके दिवशी हे आपले जग निर्माण झाले.आरंभी या पृथ्वीवर जीव नव्हते.ती म्हणजे एक नुसता मातीच्या गोळा होती.पण हळूहळू त्या गोळ्यातून हिरवे गवत वर आले व त्याचा विकास होत होत त्यांतूनच एक दिवस झुडपे व फुले दिसू लागली. पशुंच्या अंगावर केस येतात किंवा पक्ष्यांना पिसे फुटतात,त्याप्रमाणे वृक्षांना व वनस्पतींना फुले आली.नंतर जीव उत्पन्न झाले,पक्षी उडू लागले,आकाशात गाऊ लागलेपशू जमिनीवर हिंडू-फिरू लागले.


जंगलांतून गर्जना करू लागले, पशुपक्ष्यांच्या काही विशिष्ट जाती त्या त्या वातावरणास अनूकूल होत्या; म्हणून त्या तिथे तिथे जगल्या व वाढल्या.या जातींच्या ठायी धैर्य व धूर्तताही असल्यामुळे त्या वाचल्या.काही जाती दुबळ्या होत्या,काहींना कमी दिसे,

काहींना ऐकू येत नसे,काहींना हलण्या-चालण्याची साधने नव्हती, त्या नष्ट झाल्या.निसर्गाच्या लहरींतून हे दुबळे प्रकार जन्मास आले व नष्ट झाले.हेतुहीन,योजनाहीन अशा या जगातील आंधळ्या प्रयोगाचे ते बळी होते व नष्ट होणे हेच त्यांचे भवितव्य होते.

विनाशच त्यांच्या नशिबी होता. मानवप्राणी हा या मनोरंजक नाटकातला बलवान् प्राणी होय.तो या योजनाहीन नाटकांत शेवटी येऊन उभा राहिला.तो काटक होता.रानटी होता.उघडा - बोडका होता,इतर प्राण्यांप्रमाणेच तोही या भूतलावर भटकत होता.

पाला,कंदमुळे,कवचीची फळे यांवरच जगत होता व रात्री उघड्यावरच निजत होता.


पण अधिक भयंकर हिंस्त्र श्वापदांनी मानवांवर हल्ले चढविले,तेव्हा त्यांना गुहांमध्ये आश्रय शोधणे भाग पडले.हे पशुसम मानवी जीव एकेका गुहेत समुदायाने राहू लागले.त्यांच्यांत भाषा प्रकट झाली.

त्यांना एकमेकांबद्दल आपलेपणा,करुणा,मैत्री वाटू लागली. त्यांना स्वप्नात जे विचित्र आकार दिसत,त्यांना देव मानून आणि अमर जीवन व अपरंपार शक्ती त्यांच्या ठायी कल्पून,त्या काल्पनिक देवदेवतांची ते पूजा करू लागले. पुढे त्यांना धातूंचा शोध लागल्यावर ते अधिक चांगली हत्यारे तयार करू लागले;व स्वतःचा बचाव आणि दुसऱ्याचा संसार करण्याच्या क्रियेत अधिक तरबेज झाले.निरनिराळे मानवसमुदाय परस्परांशी विचारविनिमय व वस्तुविनिमय करू लागले;मालाची अदलाबदल व ठोशांची देवाणघेवाण करू लागले, आणि अशा रीतीने ते नाना कला व उद्योग शिकले. देवघेव,व्यापार,नौकानयन,शेती,काव्य,संगीत,शिल्प, राजकारण,मुत्सद्देगिरी,भांडणतंटे,फिर्यादी,मारामाऱ्या, लढाया,सारे काही ते शिकले.थोडक्यात म्हणजे ही संस्कृती,ही सुधारणा हळूहळू उत्क्रांतीने होत आली आहे.आपत्तींनी भरलेल्या या जगात स्वतःचे सारे कसे जुळवून घ्यावयाचे,हे मानव हळूहळू ठरवीत होता.तो बदल करीत,फरक करीत चालला होता,जीवनार्थ चाललेल्या या अखंड झगड्यात थोडा वेळ जगता यावे म्हणून मनुष्य प्रयत्न करीत आहे.हे सारे जीवन म्हणजे एक अखंड,

अविरत झगडा आहे.या जगात मरणाशिवाय शांती नाही.आणि अशा रीतीने आपण एपिक्यूरसच्या विज्ञानातूनच त्याच्या तत्त्वज्ञानाकडे येतो. 


ज्या पृथ्वीवर आपण जगत असतो,ती जणू आपणास थोडा वेळ भाड्यानेच मिळाली आहे.येथून निघून जाण्याची वेळ आली की आपले सारे लुबाडले जाते;व अकिंचन होऊनच आपणास येथून जावे लागते.पण आपणास मरणावर जय मिळविता आला नाही,तरी मरणाच्या भयावर आपण जय मिळवू या. 


मानवी जीवन अल्प आहे,म्हणून दुःख करीत बसण्याचे कारण नाही.उलट ते अल्प आहे,म्हणून आनंदच मानू या.मरणानंतर जाणीव नाही;मरणानंतर ना दुःख ना वेदना,ना शिक्षा ना बक्षीस,ना स्वर्ग ना नरक! या पृथ्वीवर केलेल्या चुकांबद्दल आपणास मरणोत्तर कोणी सजा देणार आहे असे नाही.मृत्यूदेवाचा तो कारुण्यपूर्ण शुभ्र हात आपणास थोपटतो व स्वप्नहीन,चिरमधुर निद्रेत नेऊन सोडतो.जगद्रुपी वेड्यांच्या घरांतून होणाऱ्या आपल्या सुटकेच्या कागदावर सही करणारा प्रेमळ रक्षक म्हणजे मृत्यू.सर्व रोगांहून भयंकर रोग म्हणजे हे जीवन.जीवनाच्या दुर्धर व भीषण रोगापासून आपणास मुक्त करणारा सौम्य व शांत वैद्यराज म्हणजे मृत्यू. पण तुम्हांपैकी काहींना जरी हे जीवन सुखाचे,चिरसुखोप -

भोगांची जणू मेजवानीच अशा स्वरूपाचे लाभले असले,तरी तुम्ही नेहमीच चैन करीत व अधाशासारखे खातपीत राहावे हे बरे का?ओ येईपर्यंत खात बसणे बरे नव्हे.पोटाला तडस लागण्यापूर्वीच उठावे.दोन घास कमीच खाल्लेले बरे.एखाद्या दमलेल्या; पण सुखी अशा मेजवानी झोडलेल्या माणसाप्रमाणे प्रसन्नपणे व हसतमुखाने सुखाची झोप घ्यावयाला जाणे बरे नव्हे का? एक दुर्दिन येईल व तुमच्या जीवनातील सारे नष्ट होईल याचे तुम्हाला वाईट वाटते.पण हा जो अखेरचा दिवस येणार आहे,तो या नानाविध हव्यासांतून,

वासनांतून व इच्छांतून सोडविणारा आणि हे हवे ते हवे अशा धावपळीपासून मुक्त करणारा असेल, ही गोष्ट तुम्ही विसरता.

मरणाची भीती झुगारून द्या व या जीवनात जे जे मंगल आनंद मिळतील,त्यांकडेच लक्ष द्या.एपिक्यूरस व 'सर्वसह'वादी स्टोइक लोक यांचे येथपर्यंत एकमत आहे.दैव बलवत्तर असल्यामुळे जे जे होईल ते ते सहन करणे हे ध्येय सामान्य;पण यापुढे मात्र दोघांत तीव्र मतभेद आहेत.स्टोइक म्हणत की,ज्या सुखांमुळे आपली प्रवृत्ती सद्‌गुणांकडे होत नाही,जी सुखे सत्कर्मांस प्रेरक होत नाहीत,ती त्याज्य होत.सुखांनी आपली समुन्नती व्हावी. याच्या उलट एपिक्यूरस म्हणे,"जी सत्कर्मे सुखावह होत नाहीत,ती कुचकामी होत" प्रथम केवळ सुखदवादी लोकांप्रमाणे तोही क्षुद्र शारीरिक सुखे वानी,वाखाणी व आपल्या विद्यार्थ्यांना सदैव शिकवी की,"जे जे सुख मिळेल ते ते भोगा,जी जी सोन्याची संधी सापडेल,ती ती पकडा." पण केवळ शारीरिक सुखांनी कायमचे समाधान थोडेच लाभणार? क्षणभर जिभेचे सुख मिळवाल,

शारीरिक सुख मिळवाल पण कदाचित् एखादे वेळ जीवनात कायमचे रोगी अगर दुःखीकष्टी होऊन जाल.क्षणिक सुखाचे पर्यवसान कायमच्या दुःखात होणे शक्य असते.


क्षणिक आनंदाच्या जीवनात असणाऱ्या प्रक्षुब्धतेपेक्षा वाटणाऱ्या जोमापेक्षा,सतत टिकणाऱ्या सुखाची शांत स्थिती अधिक चांगली.म्हणून स्थूल व क्षुद्र शारीरिक आनंदापेक्षा वेगळा असा एक नवीन शांत मनाचा आनंद तो शिकवू लागला; या जीवनातील गोंधळ च सुख-दुःखे यांकडे अनासक्त व अत्रस्त दृष्टीने पाहणे, पाण्यातील कमळाप्रमाणे अलिप्त राहणे.


एपिक्यूरस म्हणे,हे जीवन म्हणजे एक कटू देणगी आहे.ती इतकी कटू आहे की,जीवनात आपण रडत ओरडत येतो व रडत ओरडतच जीवन सोडतो. 'आदि-अंती दुःखप्रद' असे हे जीवन आहे.पण आपल्या या दुःखातूनही सुख निर्मिता येईल.म्हणून आपण दुःखाला सुखाची जननी करू या.गत दुःखाच्या आठवणी आपणाला मागाहून सुखप्रद वाटत नाहीत का?


"म्हणून थोडा विनोद शिका;विनोदी,मोकळी वृत्ती ठेवण्याचा यत्न करा.जरा प्रमाणबद्धता शिकलात म्हणजे हे साधेल.दुःख आले तर त्या दुःखाचेच अती करीत नका बसू. 'यायचेच की जरा दुःख ! बदल नको का काही!' असे गमतीने म्हणा.आपणांसभोवतालचे हे अनंत विश्व बघा,म्हणजे आपल्या चिंता व आपली दुःखे ही इतकी क्षुद्र वाटतील की,तुम्हाला हसूच येईल. 


स्वतःला जीवनाच्या विराट नाटकातील एक पात्र समजून सुखदुःखे भोगावयाला,एवढेच नव्हे,तर एखाद्या प्रेक्षकाप्रमाणे आपल्या दुःखांकडे बघून जरा हसावयाला शिका."


"वासना, इच्छा कमी करा. त्यांना मर्यादा घाला.गरजा कमी करा.जे मिळाले आहे.त्यात समाधान माना. 


महत्त्वाकांक्षा पूर्ण करणे शक्य नसेल,तर जेवढे मिळणे शक्य असेल तेवढ्याचीच महत्त्वाकांक्षा धरा. फार उच्च महत्त्वाकांक्षा बाळगून त्या फलद्रूप होणार नसतील तर त्या जरा कमी उंच करा." 


एपिक्यूरस स्वतः साधा मनुष्य होता.तो आपल्या कोणीही अनुयायांपेक्षा कमी एपिक्यूरियन होता. त्याला लालसा नव्हती,

सुखाची ओढ नव्हती.साधी ज्वारी-बाजरीची भाकरी त्याला पुरे होत असे; पण ती कोणा मित्राबरोबर खावी असे त्याला वाटे.

खाताना एखादा मित्र बरोबर असला म्हणजे झाले; मग त्याला आणखी काही लागत नसे. आपण काय खाणार, यापेक्षा कोणाबरोबर खाणार हीच गोष्ट अधिक महत्त्वाची आहे.असे तो म्हणे.एपिक्यूरस सर्वांचा मित्र होई.मैत्री जोडण्यात तो अद्वितीय पुरुष होता.मैत्री कशी जोडावी हे तोच जाणे. आपल्या सुखात सर्वांना सहभागी करणे हाच सुखी होण्याचा खरा मार्ग होय.आपले सुख सर्वांना द्या.असे करणे मोठे उदारपणाचे अगर उदात्तपणाचे आहे म्हणून मात्र नव्हे; तर जरुरीचे आहे म्हणून आपल्या जगण्यात शहाणपणा नसेल,न्यायीपणा नसेल,गोडपणा नसेल, तर आपणास आनंदाने जगता येणार नाही,सुखासमाधानाने नांदता येणार नाही.प्राचीन काळातील कन्फ्यूशियस प्रमाणे व आपल्या काळातील बर्ट्रेंड रसेलप्रमाणे एपिक्यूरस शहाणा व अविरोधी स्वार्थ शिकवित असे. 


तो म्हणे, "जर दुसऱ्यांनी आपल्या सुखाआड येऊ नये असे तुम्ही इच्छित असाल तर तुम्हीही दुसऱ्यांच्या सुखाआड येऊ नये.

स्वतःला अपाय होऊ नये म्हणून तरी दुसऱ्यास अपाय करू नका.तुम्हाला त्रास नको असेल, तर दुसऱ्यांसही त्रास देऊ नका.

स्वतः जगा आणि दुसऱ्यासही जगू द्या.प्रक्षुब्धता टाळा.उगाच धोके पत्करू नका.युद्धाच्या रानवटपणापासून दूर राहा. राजकारणाच्या घाणीत नका शिरू.प्रेमाचा अतिरेक नको,तसा अती द्वेषही नको.मैत्रीचा गोड गुण जोडा.मैत्री जोडणे हा धर्म माना.मैत्रीची पूजा करा.कारण मैत्री ही अत्यंत मधुर,अती पवित्र व सुंदर वस्तू आहे.या जगात निश्चितपणे सुखाची गोष्ट जर कोणती असेल तर ती म्हणजे खऱ्या मैत्रीने मिळणारी सहानुभूती.बाकी सारे कितपत किमतीचे आहे.याविषयी शंकाच आहे; पण मैत्रीचा आनंद ही मात्र निःशंक गोष्ट आहे. जीवनातील दुःख क्लेशांमुळे आपण मरणालाही मिठी मारतो,त्याप्रमाणे मैत्रीच्या आनंदासाठी हे जीवन कितीही कटू वाटले, तरी आपण त्याला कवटाळू या."


एपिक्यूरसला मित्रांचे सुख होते म्हणूनच त्याला साऱ्या आपत्ती सुखाने सहन करता आल्या.दारिद्र्य, प्रियजनांचा वियोग,

दुखणी,यामुळे त्याचे जीवन खरोखरच निःसार झाले होते.पण मृत्यूशय्येवरूनही तो आपल्या एका मित्राला पुढील पत्र लिहिताना दिसतो; "माझ्या आयुष्यातला हा शेवटचाच सुखाचा दिवस आहे.आणि मी तुला लिहीत आहे.मला मूत्राशयाचा रोग झाला आहे.वेदना इतक्या होत आहेत की,याहून आणखी काही दुःखदायक असू शकेल,असे मला तरी वाटत नाही.पण या अपरंपार दुःखाच्या विरुद्धबाजूच्या पारड्यात आपण कितीदा प्रेमाने बोललो व एकत्र अनेक गोष्टी केल्या त्यांच्या प्रेमळ स्मृतींचा आनंद घेतला की हे असीम दुःखही मला नसल्यासारखेच वाटते.दुःखाचे पारडे हलके होते."


आयुष्याच्या त्या शेवटच्या दिवशी त्याने या ओळी लिहिल्या व एकाहत्तर वर्षांपर्यंत रोज रात्री तो ज्याप्रमाणे डोळे मिटीत असे,त्याचप्रमाणे त्याने त्या रात्रीही शांतपणे,समाधानाने व सहजतेने डोळे मिटले, ते कायमचे.दुसऱ्या दिवशी सकाळी आपण उठू की न उठू; जागे होऊ की कायमचेच झोपी जाऊ,याचे त्याला काय होय ? तो जागा झाला असता वा कायमचा झोपी गेला असता,तरी त्याला असा काय मोठासा फरक वाटणार होता? जीवन-मरण, दोन्ही त्याला जणू सारखीच सुखप्रद होते !


२४.०२.२५ या लेखातील शेवटचा भाग…!