* विजय गायकवाड | Vijay Gaikawad

live

नमस्कार आपले स्वागत आहे. मी पुस्तके आणि मित्रांवर पैसे खर्च करतो,माझ्याकडे दगड आणि विटांवर खर्च करण्यासाठी पैसे नाहीत.- रस्किन बाँड.ही थोर माणसं व त्यांचे विचार मला पुस्तकात भेटलीत.ती भेटली आणि त्यांनी सांगितले कि, प्रत्येक दिवशी असं काही तरी करा की,ते तुम्हाला अधिक सुंदर उद्याच्या दिशेने खूप लांबवर घेऊन जाईल."- डोग फायरबाऊ.' सर्वियन कादंबरीकार मिलोराद पावीच यांचे एक वाक्य आहे ते म्हणतात - जोवर जगात पुस्तक वाचणाऱ्या वाचकांची संख्या बंदूकधारी सैनिका पेक्षा अधिक आहे तोवर काळजीच काहीच कारण नाही.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात.पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये.म्हणून अविरतपणे प्रयत्न करणारे मार्गदर्शक, मित्र धावून येतात.प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,डॉ.दीपक शेटे,आ.भरत बुटाले,प्रा.सर्जेराव राऊत,सुभाष ढगे,अनिल फारणे,डॉ.सुधीर सरवदे ,विश्वास खाडे, विनायक पाटील,संजय कुंभार,सतीश खाडे,मनोहर सुर्वे,गणेश खंदारे,तात्या गाडेकर, दादासाहेब गाडेकर, दादासाहेब ताजणे, पुस्तकातील घटना प्रसंग सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील यांनी केलेले आहे. मला लिहिण्याची प्रेरणा देणारी पुस्तके,लेखक,प्रकाशक,मित्र ही जगावेगळी माणसं माझ्या जीवनातील महत्वाचा टप्पा आहेत.... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ.मेघा गायकवाड, चिरंजीव मयान,माझ्या धावण्यातील गुरुवर्य नामदेव बरुरे,लुल्ला शेख मोठी ताई ,लहान ताई जयश्री शिंदे या सर्वांचेच मनापासून आभार व धन्यवाद मॅट्रिक फेल विजय गायकवाड

२३/७/२५

बेडूक-बाबा / frog-daddy

लेबर डेच्या सुट्टीला अजून दोन आठवडे होते.रॅफेल सेमीज कोडी ऊर्फ रॉफ आणि त्याचा चुलतभाऊ जूनियर,हे दोघं रॉक्सीज आईस्क्रीम पॅलेसमध्ये बसले होते.दोघंही बदाम आईस्क्रीम खात होते,बटरस्कॉच सायरपनं झाकलेलं,आणि वर अक्रोडांचे तुकडे घातलेलं.मेक्सिकोच्या आखातावरून कुंद,दमट आलेली हवा फ्लॉरिडा पॅन्हॅडलच्या उष्णतेनं आणिकच जड झाली होती.गाव होतं क्लेव्हिल्,अ‍ॅलाबामा.पावसाची आशा जागवतीलसे ढगही नव्हते आकाशात.आईस्क्रीम पॅलेसमध्ये शिरणारा प्रत्येक जण अंगाला घामानं चिकटलेले कपडे सोडवत बसलेला असायचा.


"काय गरमी आहे!" एक पातळसा सूट पेहेरलेला माणूस आत येत म्हणाला.


"हो! आग्या मुंग्यांपेक्षा गरम !" एक शेतकरी हसत उत्तरला.


जूनियर आणि रॅफेलला उन्ह-उकाड्याचा धाक नव्हता. जूनियरला तर चिकोबी नदीतला महाकाय अजगर पाहायची इच्छा होती.गेल्या शतकभरात शेकडो स्थानिक लोकांनी चिकोबीच्या डोहात काहीतरी गूढ, अजस्र,सापासारखा जीव पाहिला होता म्हणे.मोठी प्रसिद्ध दंतकथा होती ही,त्या भागातली.


रॅफ नाराज होता. "ए! माझे आईबाबा मारतील मला. त्यांना वाटतं की तू मला बहकवतोस."


('वारुळ पुराण',माधव गाडगीळ',ई.ओ.विल्सन,अनुवाद - नंदा खरे,मनोविकास प्रकाशन )


असं. मग तर झालं?" जूनियरपाशी रॅफच्या अडचणींना उत्तरं होती."आपण त्यांना सांगू नोकोबी तलावात मासे पकडायला जातो आहोत,


दोन दिवसांनी सकाळी आठला जूनियर आला.दोन्ही मुलांनी रॅफच्या आईला भरघोस आश्वासनं दिली,अमुक करू आणि तमुक करणार नाही,अशी.मग दोघही सायकली घेऊन बाहेर पडले.गावाच्या वायव्येला जायचं होतं.फार वाहतूक नव्हती.दोन टोमॅटो लादलेल्या ट्रक्स फक्त भेटल्या,गावाकडे जाणाऱ्या.जॉन्सनच्या शेताजवळ दोघांनी सायकली झुडपांत लपवल्या आणि ते जंगलकडेच्या ओढ्यात उतरले.बुटांच्या लेसेस बांधून गळ्यात अडकवल्या.पँटी गुडघ्यांपर्यंत दुमडल्या.छान वाटत होतं,बारीक खड्यांवरनं वाहणाऱ्या थंड,स्वच्छ पाण्यात.ओढ्यासोबत दोघं चिकोबी नदीला भेटायला जात होते.छोटेछोटे मासे किनाऱ्याजवळच्या गवतात लपायला पळत होते.एक चिखलातलं कासव पाठीवरचं शेवाळ सांभाळत दगडासारखं बसलं होतं.एक बारका साप झाडाच्या फांदीवरनं पाण्यात उडी मारून पळून गेला.एक लाल खांदे असलेली घार कर्कश ओरडत उडाली. "घरटी बांधायचा मोसम संपलाय." रॅफ म्हणाला. त्याच्या ओळखीची होती या जंगल-ओढ्याची प्रजा.मैलाभरात ओढा रुंदावला व गुडघ्यांपेक्षा खोल झाला.जवळ कॅट्टेल पाणगवत होतं.


पाण-ओक,सायप्रेस वगैरे नेहमीचे वृक्ष होते,विरळ पसरलेले.मुलं ओढ्यातला चिखल टाळून चालत होती. "दलदल सांभाळ!" जूनियर म्हणाला.रॅफेल त्याच्या मागून चालायला लागला.काही गडबड झालीच,तर जूनियर आधी अडकेल !


लवकरच खुद्द चिकोबी नदी आली.संथ,सुस्त वाहणारी. सकाळच्या उन्हात हिरवी निळी,चंदेरी लाटा असलेली. पाण्यातल्या काड्या संथपणे चालणाऱ्या माणसाच्या वेगानं वाहत होत्या.मध्येच किनाऱ्याची जमीन उंच चढत गेली.उंचीवरच्या झाडांवरून कळत होतं,की मोठ्यात मोठे पूरही तिथे पोचत नव्हते.या टेकाडाच्या नदीकडच्या बाजूला तेज उतार होता,झाडी नसलेला आणि पिवळट मातीचा.इतर तीन बाजूंचे उतार मात्र जास्त सपाटसर होते.या टेकाडाजवळ 'तमालपत्रा'च्या झाडांना बांधून ठेवलेल्या पाचसहा होड्या होत्या.झाडी उंच होती. म्हणजे पाणी चढलं तरी बांध्यांना काही न होता होड्या पाण्यावर तरंगल्या असत्या.या भागात पाणी चढणं-उतरणं नेहमीचं होतं,आणि बांधायची पद्धतही सगळ्यांच्या ओळखीची होती.


जूनियर एका बोटीजवळ जाऊन तिला बांधणारा दोर सोडू लागला.तिच्यात दोन वल्ही आणि बसायला फळीही होती.


"कुणाची रे?" रॅफनं विचारलं. "कुणास ठाऊक." जूनियर गाठ सोडत म्हणाला.रॅफनं त्याच्या हातावर हात ठेवला. "ए! चोरायची नाही आहे, बोट!" "चोरतं कोण आहे ? उसनी घेतो आहोत,आपण पोटोमो धक्क्यावर ठेवून देऊ.नेहमीच करतात असं,सगळे जण." खरं तर जूनियरच्या या बोलण्यावर रॅफचा विश्वास नव्हता. पोटोमोपासून इतक्या वर प्रवाहाच्या उलटं वल्हवत आणणं अवघड होतं.पण बोटीच्या मागे आऊटबोर्ड मोटर बसवायला जागा होती,आणि आणि मजा येत होती! खुद्द चिकोबी नदी जवळ होती,आणि एखादे वेळी तो अजगरही आसपासच होता !


रॅफ जूनियरपेक्षा लहान होता,आणि "मला ह्यानं भरीला पाडलं" म्हणणं सोपं होतं. मग जूनियरनं काय तो बचाव दिला असता.


जूनियरनं बोट सोडवली,आणि चिखलातून ओढत, ढकलत दोघांनी ती प्रवाहात नेली.आता दोघही उड्या मारून चढले.बोटीत,किनाऱ्याला धरून धरून ते प्रवाहासोबत वल्हवत होते.संपूर्ण नदीवर इतर एकही बोट नव्हती,ना खाली जाणारी,ना वर जाणारी.


"नेहमी दोनतीन जण तरी मासे पकडताना दिसतात." जूनियर म्हणाला. "बाबांनी आणलं होतं मला आणि ताईला एकदा."


"आश्चर्यच आहे,आज कोणी नाही हे.किती छान जागा आहे! मासेही भरपूर असणार." रॅफ म्हणाला.


"चिखल ! चिखलाला कंटाळतात सगळे जण.बहुतेक लोक चिकोबी टाळून दक्षिणेला एस्कांबिया नदीत जातात.तिच्यावर धक्के वगैरेही जास्त आहेत."


रॅफ नदीकडेचं जंगल पाहत होता.चांगलं दाट होतं. एका मासेमाराचं झोपडं दिसलं,तेही रिकामं.एका झाडाच्या फांदीला एक दोर बांधला होता."पोरं लटकून, झोके घेऊन उड्या मारतात पाण्यात." जूनियर म्हणाला.


ओंडक्यांवर दोनतीन कासवं बसली होती,उन्हं खात. बोट जवळ आल्यावर पाण्यात शिरली.


एक साप किनाऱ्याकडे पोहत गेला.किनाऱ्याच्या वाळूत एक निळसर बगळा माशांची वाट पाहत ध्यानस्थ उभा होता.दोन बदकं सरळ रेषेत उडत गेली,नदीच्या खालच्या भागाकडे.एक गिधाड उष्ण हवेसोबत चकरा मारत उंच,उंच जात होतं.ठिपक्यासारखं दिसेल इतकं उंच गेलं ते.


दोन लांब दुहेरी शेपट्यांचे घारींसारखे पक्षी नदीपलीकडच्या झाडीवर विहरत होते. "स्वॉलोटेल घारी असतील त्या!" रॅफ म्हणाला. "मी पहिल्यांदाच पाहतो आहे. झाडांवरचे साप खातात त्या."


जूनियर,रॅफ,दोघंही वर पक्षी पाहत होते,पण खरं लक्ष होतं नदीकडे,चिकोबीचा अजगर दिसायच्या आशेनं. दिवसाढवळ्या दिसणं कठीण होतं,पण तरी आशा असतेच ना! आणि एकाएकी दार उघडावं तसं कडेचं जंगल उघडलं.वाळूच्या पट्ट्यावर धक्क्याला बांधलेली एक लहानशी बोट होती.मागे एक पायवाट,पन्नास पावलं आतल्या एका घराकडे जाणारी.रंगवलेलं नव्हतं घर.लाकडी आणि टिनाचं छत असलेलं.एका बाजूच्या फळ्या ताज्या दिसत होत्या,नव्यानं ठोकलेल्या.जोतं तीन पायऱ्या उंच होतं.एक लहानसा व्हरांडा.दारालगत एक खिडकी.तिच्यावर बोट वाळूत टेकली,


शिल्लक भाग पुढील लेखामध्ये…

२१/७/२५

कार्बन-डाय-ऑक्साईडची पोकळी / Carbon dioxide cavity

निसर्गाची चक्रीयता दर्शविणाऱ्या कोणत्याही चित्रात झाडं मुख्यस्थानी असतात.त्यांच्यामुळे परिसंस्था संतुलित होत असल्याचे जाणवते.
प्रकाश संश्लेषणातून हायड्रोकार्बनची निर्मिती होते,ज्यामुळे झाडांची वाढ होऊ शकते.
खोड,फांद्या आणि मुळातून झाडे त्यांच्या आयुष्यात सुमारे बावीस टन कार्बन-डाय-ऑक्साईड साठवून ठेवू शकतात.झाड वठले की बुरशी आणि सूक्ष्मजीवांमुळे विघटन प्रक्रिया चालू होते आणि पुन्हा हा तेवढाच बावीस टन कार्बन-डाय-ऑक्साईड वातावरणात हरितगृह वायू (ग्रीन हाऊस गॅस) म्हणून सोडला जातो. 

या कारणामुळे हवामान बदलाच्या कारणांमध्ये लाकूड जाळण्याचे योगदान नाही,असे तटस्थ असल्याचे मानले जाते. 

द हिडन लाईफ ऑफ ट्रीज,पी ट र वो ह्ल ले बे न
अनुवाद - गुरुदास नूलकर,अरविंद घनश्याम पाटकर
 मनोविकास प्रकाशन

हा वायू सूक्ष्मजीवांकडून उत्सर्जित झाला काय किंवा घरातल्या शेकोटीतून निघाला काय,दोन्ही सारखेच आहे.पण शेकोटीपेक्षा जंगलातील प्रक्रिया खूपच क्लिष्ट असते.जंगल हे एक कार्बन-डाय-
ऑक्साईडची पोकळी (व्हॅक्यूम) आहे,असे म्हणता येईल.इथे वातावरणातून कार्बन-डाय-ऑक्साईडचे शोषण सतत चालू असते आणि त्याचा साठा झाडातून केला जातो.वठलेल्या झाडातून थोड्याफार प्रमाणात हा वायू पुन्हा वातावरणात गेला तरी बहुतांश भाग हा त्या परिसंस्थेतच बंदिस्त राहतो.वठलेल्या झाडाच्या खोडाचा भुगा होईपर्यंत ते करतडले जाते.आणि उरलासुरला जैविक माल पावसामुळे जमिनीत जिरतो. 

जमिनीत खोलीप्रमाणे तापमान घटत जाते त्यामुळे हा माल जसजसा खाली जातो तसतशी विघटन प्रक्रिया जवळ जवळ थांबून जाते.आणि उर्वरित कार्बन-डाय-ऑक्साईड शेकडो वर्ष जैविक मालाच्या रूपाने मातीत बंदिस्त होतो.लाखो वर्षाने त्या एकवटलेल्या जैविक मालाचा दगडी कोळसा होणार असतो.आज उत्खनन केली जात असलेली खनिज इंधने ही सुमारे तीनशे दशलक्ष वर्षांपूवींची वठवलेली झाडे आहेत.त्या काळात आजच्या झाडांपेक्षा ती वेगळी दिसत असे.
सहा फुटापर्यंत खोडाचा घेर आणि शंभर फुटी उंच असलेली वनस्पती फर्न किंवा हॉर्स टेलसारखी दिसत असे.बहुतेक झाडे दलदलीमध्ये वाढत होती आणि वठली की पाण्यात पडून राहायची.त्यामुळे त्यांची कुजण्याची प्रक्रिया अतिशय संथ होती.

हजारो वर्षांनी कुजून रूपांतरित झालेल्या जैविक मालाचा जाड थर,त्याला 'पीट' म्हणतात,होत असे व त्यावर दगडाची खडी जमून ते दाबले जात असत.
याचा परिणाम म्हणजे पीटचे रूपांतर कोळशात होत असे.याचा अर्थ आजचे वीजप्रकल्प जीवाश्मयुक्त झाडे जाळून वीजनिर्मिती करीत आहेत. 

या प्रकल्पांतून उत्सर्जित होणारा कार्बन डाय-
ऑक्साईड आपण आजच्या झाडांना त्यांच्या पूर्वजांप्रमाणेच मुक्तपणे शोषू दिला तर किती छान होईल नाही का? मग त्याचा साठा मातीतच होत जाईल.आज कोळसा होण्याची प्रक्रिया जवळजवळ बंद पडली आहे,कारण मोठ्या प्रमाणावर जंगलतोड करून लाकडाचा औद्योगिक वापर केला जातो.पण यामुळे मातीवर उबदार सूर्यप्रकाश पडतो आणि सूक्ष्मजीवांना खोलपर्यंत जैविक मालाचे विघटन करता येते.पूर्वी जमिनीत खोलवर जो कार्बन-डाय-
ऑक्साईड बंदिस्त होऊन त्याचा पुढे कोळसा बनायचा,तो कार्बन-डाय-ऑक्साईड आता विघटनामुळे पुन्हा हवेत सोडला जातोय.जितकी वृक्षतोड होते तितका कार्बन-डाय-ऑक्साईड वातावरणात सोडला जातो आणि कार्बन-डाय-
ऑक्साईडचे जितके उत्सर्जन घरातल्या शेकोटीतून होते तितकेच जंगलांमधल्या जमिनीवरून होऊ लागले आहे.त्यामुळे आपल्या भागातील जमिनीखालचे कार्बन साठे ज्या गतीने वाढले त्याच गतीने घटत आहेत. 

तरीही जंगलातून चालताना तुम्हाला कोळसा निर्मिती प्रक्रियेची प्राथमिक अवस्था दिसून येईल. जमिनीत थोडं खोदलं तर फिकट रंगाचा थर लागेल.इथपर्यंत वरच्या भागाच्या मातीत भरपूर कार्बन साठवलेला असतो.आणि या अवस्थेत जंगलाला राहू दिलं तर कोळसा वायू आणि खनिज तेल उत्पादनाची सुरुवात होते. अभयारण्य आणि सुरक्षित जंगलातून हे असंच चालू असतं.युरोपमध्ये रोमन आणि सेल्ट राज्य असतानाही जंगलतोड चालू होती,त्यामुळे आपल्या जगलातून आज जो जैविक मालाचा अभाव आहे, हा फक्त अर्वाचीन वृक्षतोडीमुळे नाही.

सर्व वनस्पती आपले आवडते खाद्य अशाप्रकारे वातावरणातून सतत काढून घेत असतात,असं करणं हे मूर्खपणा नाही का? समुद्रातील शैवाल (अल्गी) सुद्धा वातावरणातला कार्बन-डाय-ऑक्साईड काढून टाकतात.आणि इथेही कार्बन-डाय-ऑक्साईड त्यांच्या मृत्यूनंतर समुद्राच्या तळाशी जातो आणि तिथे कार्बनचे पदार्थ तयार होतात.लाखो वर्ष या प्रक्रियेतून,जलचरांचे मृतदेहातून आणि प्रवाळांनी उत्सर्जित केलेल्या कॅल्शियम कार्बोनेटमधून वातावरणातील कार्बन-डाय-ऑक्साईडचा प्रचंड मोठा साठा समुद्रामध्ये आहे.भूशास्त्रातील कार्बोनिफेरस युगामध्ये कोळशाची निर्मिती चालू झाली तेव्हा वातावरणात कार्बन-डाय-ऑक्साईडचे प्रमाण आजच्यापेक्षा नऊ पट जास्त होते.यानंतर प्राचीन जंगलांमधून आणि इतर काही प्रक्रियेतून हे प्रमाण कमी झाले पण तरीही ते आजच्यापेक्षा तिप्पट होते. 

वातावरणातील कार्बन-डाय-ऑक्साईड संपून जाईपर्यंत जंगल परिसंस्थांची कार्बन साठवण्याची प्रक्रिया चालू राहील का?आज उपभोगाच्या संस्कृतीमुळे या प्रश्नाचे उत्तर शोधण्याची काहीच गरज नाही.कारण पृथ्वीवरील कार्बन-डाय-ऑक्साईड शोषण आणि उत्पादातील फरक आपणच उलटवला आहे.इथले सर्व कार्बन साठे आपणच संपवत आहोत.खनिज तेल,वायू आणि कोळशाचा ऊर्जेसाठी आणि उब देण्यासाठी अति वापर होत आहे.त्यातून पृथ्वीचा कार्बन साठा पुन्हा प्रचंड प्रमाणात वातावरणात जात आहे.हे हवामान बदलाच्या पथ्यावर पडते,कारण हरितगृह वायूंना आपण पुन्हा वातावरणात सोडून त्यांची एका प्रकारे सुटका करीत आहोत.पण एवढी घाई करू नका. 

आज वातावरणातील कार्बन-डाय-ऑक्साईडमुळे जंगलांना अधिक पोषण मिळत आहे हे काही प्रमाणात खरं आहे.हल्ली जंगलातील जैविक मालाच्या मापनात असे दिसते की,झाडांची वाढ पूर्वीपेक्षा अधिक वेगाने होत आहे.

लाकूड उत्पादनाच्या आकडेवारीत आज आपल्याला बदल करावा लागतो,कारण काही दशकांपूर्वीपेक्षा आजचे प्रमाण एक तृतीयांशने वाढलेले दिसते.हो का? पण जर तुम्ही झाड असाल तर संथ वाढ होणे हेच योग्य असते.शेतीमध्ये वापरात असलेल्या खतांच्या अतिरिक्त नत्रामुळे भरभर वाढ होते,ती झाडांच्या आरोग्याला पूरक नाही.म्हणून कमी कार्बन-डाय-ऑक्साईडमुळे झालेली संथ वाढ हाच झाडांसाठी दीर्घायुष्याचा मार्ग आहे मी जंगल व्यवस्थापन विज्ञानाचे शिक्षण घेत असताना असे शिकलो की,वयस्कर झाडांपेक्षा लहान वयाच्या झाडांची वाढ अधिक वेगाने होते.हे आजही खरे आहे आणि यामुळेच जंगले भरभर पुनरुज्जीवित होतात.
पुनरुज्जीवित ? पण याचा अर्थ जुनी झाडे काढून त्या जागी नवीन लागवड करणे.जंगल मालकांची संघटना आणि व्यावसायिक लागवड करणाऱ्या प्रतिनिधींच्या मते असे केल्यानेच लाकडामध्ये योग्य प्रमाणात कार्बन-डाय-ऑक्साईड साठवला जातो.साधारण साठ ते एकशे वीस वर्ष झाली की झाडाची कार्बन साठा करण्याची क्षमता कमी होत जाते, पण प्रजातीप्रमाणे हे बदलते.मग ते झाड या वयानंतर लाकडासाठी तोडले जाण्यास योग्य ठरवले जाते, कारण ते आता वृद्ध झालं.चिरतरुण अवस्थेची मानवी कल्पना आपण झाडांना तर लावली नाही? 

कारण खरंतर एकशे वीस वर्षांच्या झाडाचे मानवी जीवनकालावधीच्या तुलनेत जेमतेम शाळकरी वय संपत आलेले असते.पण ही जुनी वैज्ञानिक गृहितकं एका ताज्या अभ्यासाच्या आधारे पूर्णपणे चुकीची ठरली असल्याचे दिसते.
जगातील अनेक राष्ट्रांच्या शास्त्रज्ञांनी एका संशोधनात विविध खंडातील सात लाख वृक्षांचा अभ्यास केला.यातून आश्चर्यकारक गोष्ट समोर आली ती म्हणजे,झाड वयस्कर झालं म्हणजे ते अशक्त,नाजूक आणि असमर्थ झालंय असं अजिबात नाही,उलट जितकं झाड वयस्कर तितकी त्याची वाढ वेगाने होते.

तीन फुटाहून अधिक घेर असलेल्या झाडात त्यांच्या अर्धा घेर असलेल्या झाडापेक्षा तिप्पट वेगाने जैविक मालाचे उत्पादन होते. उलट त्यांच्यामध्ये तरुण झाडांपेक्षा अधिक ऊर्जा आणि उत्पादन क्षमता असते.आपल्या दृष्टीने हवामान बदल रोखण्यासाठी हे महत्त्वाचे आहे.या अभ्यासानंतर नवीन लागवड करून जंगलांचे पुनरुज्जीवन करण्याची पद्धत बरोबर नाही,असे सांगितले गेले पाहिजे.फार फार तर असे म्हणता येईल की झाडांचे वय वाढते तसे त्यांच्या लाकडाचे मूल्य कमी होत जाते.वयस्कर झाडांच्या खोडातून बुरशी धरण्याची शक्यता वाढते आणि विघटन प्रक्रिया सुरू होऊ शकते.

पण यामुळे झाडाच्या वाढीचा वेग मात्र जराही कमी होत नाही.हवामान बदलाच्या लढाईत शस्त्र म्हणून झाडांचा वापर करायचा असेल तर त्यांना वयस्कर होऊ देणं,हेच इष्ट आहे. निसर्गसंवर्धन करणाऱ्या संस्था हेच मागत आहेत.

१९/७/२५

चांदणी रात / moonlit night

निसर्गशिबिराच्या राहुट्या नदीपासून दोन किलोमीटर दूरवर उभ्या होत्या.आठ ते सोळा वयोमान असलेल्या वीस मुलामुलींनी त्या शिबिरात भाग घेतला होता.हे सारे जण पहिल्यांदाच जंगलात आले होते.या जंगलाच्या दर्शनानं ते भारावून गेले होते.एका राहुटीत रमेश व सुरेश ही जुळी भावंडं रात्री झोपली होती.
मध्यरात्रीनंतर रमेशला जाग आली.त्यानं राहुटीची समोरची कनात उघडली. बाहेर जिकडेतिकडे चंद्राचा प्रकाश पडला होता. समोरचं घनदाट जंगल,पऱ्यांचं वास्तव्य असलेल्या एखाद्या किल्ल्यासारखं दिसत होतं.साग,धावडा, साजा,बिजा इत्यादी झाडांचे सरळसोट बुंधे एखाद्या खांबाप्रमाणे दिसत होते.

झुडपांवर चंद्रप्रकाशाचे कवडसे पडल्यामुळे तिथे प्रकाशाची नाजूक नक्षी उमटलेली होती.दोन झाडांच्या बुंध्यांना जोडलेल्या देवकोळ्याच्या अजस्त्र जाळीत पडलेले दवाचे थेंब रत्नांसारखे चमकत होते.या साऱ्या दृश्यामुळे रमेशला जणू रानभूल झाली.

तो अंथरुणावरून उठला.पायांत बूट घातले.
हातात कोयता घेतला व त्यानं पाऊलवाटेनं जंगलाची वाट धरली.त्याच्या हालचालीनं सुरेशलाही जाग आली होती.तो देखील रमेशच्या मागून जाऊ लागला.या सात-आठ दिवसांच्या मुक्कामात जंगलातून येणाऱ्या पशुपक्ष्यांच्या आवाजांची ओळख त्याला झाली होती.त्या रात्री रमेश अंथरुणावर पडल्या पडल्या त्याचे डोळे मिटू लागले.तेव्हा एखाद्या अंगाईगीताप्रमाणे पखमांजराचा आवाज येऊ लागला.तेव्हा त्याला कधी झोप लागली हे कळलंदेखील नव्हतं.

आता जंगलातील पाऊलवाटेनं जात असता कांचनमृगाचा टाहो ऐकू येत होता.मध्येच सांबर ओरडे.नदीकडे जाणाऱ्या या वाटेवर झाडांची कमान उभी होती.अंजिरी रंगाच्या सावल्यात चांदीची नाणी पसरावीत तसे चंद्रप्रकाशाचे कवडसे दिसत होते चांदण्या रात्री जंगल कधीच शांत नसतं.सारं वातावरण अद्भुत अशा संगीतानं भरलं होतं.चांदीच्या घंटेसारखी हळुवार किणकिण ऐकू येत होती.

रातकिड्याचं संगीत ऐकू येत होतं.झाडांच्या ढोलीतील वृक्षमंडूक गात होते.मध्येच रानपिंगळ्याचा आवाज येई.प्रत्येक झाडाची वृक्षदेवता असते.ती त्या झाडाचं संरक्षण करते. त्याचं संगोपन करते.अशा सात झाडांवरच्या वृक्षदेवतांनी पाहिलं की,दोन अजाण व निष्पाप बालकं नदीकडे जात आहेत.या जंगलात अशा रात्री त्यांना पावलोपावली धोका होता.त्या सात देवतांनी त्या बालकांवर पाखरमाया धरली.त्या बालकांच्या नकळत त्या देवता एका झाडावरून दुसऱ्या झाडावर जात होत्या.बालकांनी भीतीनं वर पाहिलं, तर फक्त पानापानांतून सळसळ ऐकू येत होती.ती नदीकिनारी पोचली.नदीचं वाळवंटी पात्र दिसत होतं.त्यातून चांदीच्या पाटाप्रमाणे रुंद पात्रातून नदीचा संथ प्रवाह वाहत होता.पात्रात अधूनमधून मोठमोठ्या काळ्या शिळा विखुरल्या होत्या. इतक्यात चंदेरी वर्णाची एक मासोळी उंच उडी घेऊन किनाऱ्यावर पडली.काठावर उभ्या असलेल्या झाडांच्या काळ्यानिळ्या सावल्या पाण्यावर पडल्या होत्या.नदीतून संथ वाहणाऱ्या पाण्याचं गूढ गुंजन ऐकू येत होतं.ती पुढे पाऊल टाकणार इतक्यात कुठूनतरी आवाज आला,"पुढे जाऊ नका!" आश्चर्यचकित होऊन त्यांनी वर,
खाली अन् समोर पाहिलं.त्यांना तो आवाज त्यांच्या आईच्या आवाजासारखा वाटला. 

त्यांना वाटलं,आपण स्वप्नात तर नाही ना! क्षणातच ती नदी अन् तिच्या काठचं जंगल जणू जिवंत झाल्यासारखं वाटलं.

निळावंती - मारुती चितमपल्ली - साहित्य प्रसार केंद्र सिताबर्डी नागपूर

एवढ्यात काळे,पिवळे वेटोळे पट्टे असलेला रंगीबेरंगी रिबिनीसारखा साप त्यांना दिसला.तो झुडपातून नदीकडे चालला होता.त्यानं आपल्या द्विजिभा बाहेर काढल्या.पाण्याला स्पर्श करून काही थेंब तोंडात घेतले अन् अंधाराची वाट धरली. मोठ्या शिळेखाली बसलेला बेडूक टुणकन उडी मारून त्यांच्या दिशेने आला व पायाजवळ आदळला.तो बेडूक आपल्या मोठ्या डोळ्यांनी त्यांच्याकडे पाहू लागला.बेडूक दिसायला गलेलठ्ठ व कुरूप असला तरी त्याचे डोळे मात्र सुंदर होते. त्यात सोनेरी चमक होती.
नंतर तो टुणटुण उड्या मारत चंदेरी वाळूतून जंगलकाठच्या अंधारात गुडूप झाला.इतक्यात एका हुदळ्याच्या मादीनं पाण्यातल्या एका शिळेवर उडी घेतली.एक दीर्घ शीळ मारताच पलीकडच्या काठावर असलेल्या पिलांनी तिच्याकडे धाव घेतली.ती अवखळ पोरं पाण्यातून डुंबत डुंबत आईकडे आली. 

नदीच्या काठावर उतरती दरड होती.आई व तिची दोन पिलं त्या उतरत्या दरडीचा उपयोग घसरगुंडी
सारखा करून बराच वेळ खेळत होती. असे प्राणी त्यांनी प्राणिसंग्रहालयात पाहिले होते.

जंगलातील सगरीवरून एक भेकर थांबत थांबत येत होतं.त्याचे टपोरे डोळे चंद्रप्रकाशात चमकत होते.मध्येच ते आपले कान आवाजाचा कानोसा घेण्यासाठी चारी दिशांनी खालीवर फिरवत होतं. बऱ्याच वेळानं ते पाणी पिण्यासाठी आलं.त्याच्या मुखातून ओघळणारी पाण्याची धार एखाद्या चांदीच्या तारेसारखी चमकत होती.नाकपुड्या फेंदारून त्यानं आजूबाजूच्या आवाजाचा कानोसा घेतला.रमेश व सुरेश कितीतरी वेळ अगदी स्तब्धपणे उभे राहून त्याच्याकडे बघत होते. येणाऱ्या वासामुळे त्या भेकराला त्यांची चाहूल लागली.अगदी कुत्रं भुंकावं तसं ते ओरडलं आणि क्षणार्धात आलं तसं जंगलात नाहीसं झालं.हुदळ्या आणि भेकर निघून गेल्यावर ते दोघे नदीची दरड चढून जिथे वळण होतं तिथे आले.तिथल्या कळकाच्या बेटातील काही कळक ओणवून नदीच्या पाण्याला स्पर्श करीत होते.

ते दोघे नदीच्या वाळवंटाकडे पाहत होते.इतक्यात कोल्ह्याएवढा एक प्राणी त्यांच्या दिशेने येत असलेला त्यांना दिसला.त्यांनी प्राणिसंग्रहालयात पाहिलेल्या चांदी अस्वलासारखा तो दिसत होता.
काळा रंग आणि पाठीवरून पांढरा पट्टा पार तोंडापर्यंत गेलेला. त्याच्या मागून आणखी एक चांदी अस्वल व तिची दोन पिलं येताना दिसली.हे सारं कुटुंब नदीच्या पात्रातील वाळूवर आल्यावर डोकं जमिनीवर टेकवून कोलांट्या मारण्याचा खेळ खेळू लागलं. क्षणभर दोघांना आश्चर्य वाटलं.जनावरंदेखील माणसासारखीच खेळतात तर ! नंतर ते सारं कुटुंब जंगलात निघून गेलं.

रमेश जागच्याजागी स्तब्ध उभा राहिला.सहा फूट लांबीचा एक साप वळणं घेत पाण्याकडे जात होता.त्याचं शेपूट निमुळतं होतं.तोंड पसरट होतं. त्याला कसलीतरी चाहूल लागली तसा त्यानं फणा उगारला.तेव्हा रमेशला कळलं,की तो नाग आहे.

 तो भयंकर विषारी असतो,हे त्याला ऐकून माहीत होतं. बराच वेळ तो फुसफुसत होता.दंश करण्याची त्याची इच्छा नव्हती.काही वेळानं त्या दोघांच्या बाजूनं वळसा देऊन तो नदीकडे निघून गेला.ते नदीच्या उंच दरडीवर उभे राहून समोर पाहत होते.नदीचं पात्र चांदण्यात चमकत होतं.पलीकडे घनदाट जंगलाची भिंत उभी होती.नवीन पालवी फुटलेल्या पिंपळ वृक्षाची पानं सोन्यासारखी चमकत होती.वीस-पंचवीस फुटांवर झुडपाच्या जाळीतून बिबट्या डोकावला.

तो पिवळसर रंगाचा असून त्याच्या सर्वांगावर काळे ठिपके होते.तो झुडपातून बाहेर आला तसं त्याचं सर्वांग चांदण्यात चमकू लागलं.तो त्या मुलांसमोर उभा राहिला. 

शिबिरातील वनाधिकाऱ्यानं त्यांना सांगितलं होतं की,वाघ किंवा बिबट्या दिसला की घाबरून पळू नका.एखाद्या झाडाच्या आडोशानं स्तब्ध,शांतपणे उभे राहा.अशी रानटी जनावरं त्यांच्या वाटेला गेल्याशिवाय कोणावर हल्ला करीत नाहीत.

बिबट्यानं एक पाऊल उचललं.पुन्हा जमिनीवर टेकवलं.एकदा इकडेतिकडे नजर टाकली.शेपटी इकडून तिकडे हालवली.एक डरकाळी फोडली. तसे ते दोघे गर्भगळीत झाले.त्यांची हृदयं वेगानं धडकू लागली.त्यांचं एकएक स्पंदन घड्याळाच्या टिक्ऽटिक्ऽऽ प्रमाणे ऐकू येत होते.

इतक्यात एक चमत्कार घडला.निमुळते पंख असलेल्या सात वृक्षदेवतांनी त्या मुलांच्या भोवती फेर धरला.त्यांना कळेना की या कोण आहेत.त्या दिसायला पऱ्यांसारख्या दिसत होत्या.बिबट्या त्यांना ओळखत होता.अनेक वेळा त्यानं या देवतांना पाहिलं होतं.तो त्यांच्याकडे पाहत होता. शेपटी इकडून तिकडे हालवत होता.

कितीतरी तास ते दोघे देवतांच्या फेऱ्यात होते. शेवटी बिबट्यानं तिथून काढता पाय घेतला. नदीकाठच्या जंगलातून चालत असताना मध्येच तो मागे तोंड वळवून पाहत असे.एकदम त्यानं झुडपात उडी घेतली व तो दिसेनासा झाला.

त्या सात वृक्षदेवता त्यांना म्हणाल्या, "चला मुलांनो, आता परतू या." पहाटे ते दोघे आपल्या राहुटीत प्रवेश करून झोपी गेले.त्यांच्याविषयी कोणालाच काही कळलं नाही. कारण त्यांच्या सांगण्यावर कोणीच विश्वास ठेवला नसता.


१७/७/२५

पैसा - एक देणगी \ Money - a donation

पैसा हे तर फक्त एक साधन.चांगल्यासाठी तो एक ताकद होऊ शकतो,काही भयानकासाठी ही,किंवा नुसता पडून राहिल्यास निरर्थक.


आयुष्यात कधी कधी अशा वेळा येतात,की आपण करतोय त्यातून काही निष्पन्न होणार आहे की नाही,या विषयी आपण साशंक असतो.अचानक,कुठूनतरी एक अगदी साधीशी-छोटीशी खूण मिळते आणि वाटतं की आपण योग्य मार्गावर चाललो आहोत.जेव्हा जेसन स्टीव्हन्स आमच्या दुसऱ्या मासिक सभेला आला,तेव्हा असंच घडलं.


कॉन्फरन्स रूममध्ये मी आणि जेसन आपापल्या ठराविक जागी बसून त्याच्या अल्पाईन ऑस्टिनमधल्या कामाच्या अनुभवाविषयी बोलत होतो.मिस् मागरिट कपाटामधला रेड स्टीव्हन्सचा खोका घेऊन आली. काही न सुचवता सांगता जेसनने खुर्चीतून उठून, मागरिटच्या हातातून खोका घेऊन टेबलाच्या टोकावर ठेवला.त्यात काय विशेष असं वाटेल किंवा अगदी क्षुल्लक गोष्ट वाटेल खूप जणांना,पण जेसनमध्ये प्रगती झालीय हे मला जाणवलं.नेहमी अशा छोट्या गोष्टींकडे त्याचं लक्ष नसायचं.ही घटना लहान असली तरी माझ्या मते सकारात्मक खूण होती.


त्या मोठ्या पडद्यावरनं रेड स्टीव्हन्स आमच्याकडे डोळे रोखून बघायला लागला.चेहऱ्यावर जरा मिस्कल भाव होते.गस् कॉल्डवेलच्या रँचवरच्या जेसनच्या कामाच्या अनुभवाबद्दल गस् च्या मनात ते भाव असतील अशी शंका मला चाटून गेली.


त्याचा आवाज घुमला."इडनचे नंदनवन,जे टेक्सस् म्हणून ओळखलं जातं,तिथून सुखरूप परतल्याबद्दल तुझं मी स्वागत करतो,जेसन.गस् कॉल्डवेलच्या संगतीत एक महिना काढलास तू.गळवं झालेले हात पाण्यात धरण्याचा उपयोग होतो नक्कीच." 


मी जेसनकडनं चक्क अस्फूट हास्याचा आवाज ऐकला.रेडचे बोलणे चालू झाले."जगात सर्वात जास्त गैरसमज असलेल्या गोष्टीबद्दल,म्हणजेच पैशाबद्दलआज आपण बोलणार आहोत.पैशानं जे करता येतं ते दुसऱ्या कशानंही करता येत नाही.पण जगातल्या उरलेल्या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर पैसा कस्पटासारखा भासतो "


"उदाहरणार्थ,जगातला अख्खा पैसा तुझ्या आयुष्याचा एक दिवस वाढवू शकत नाही.म्हणून तर तुला ही दृश्य फीत बघता येत्येय आत्ता.पैसा कुणाला सुखी करत नाही हे जाणणं फार महत्वाचं आहे.मी लगेच तुला हे ही सांगतो की गरिबी पण तुला सुखात ठेवणार नाही.मी श्रीमंत होतो.आणि गरीब होतो,आणि बाकी परिस्थिती तशीच असली तर श्रीमंत असणं दोहोत बरं."


आम्ही सगळे हसलो तेंव्हा.


रेडने जरा गंभीर भाव आणले आणि बोलणे चालू ठेवले.

"जेसन,पैसा काय चीज आहे,याची तुला कल्पना नाही.आणि त्याचे मोल,ही संकल्पना तुला माहीत नाही. तुझा दोष नाही हा,तो माझा दोष आहे.पण येत्या तीस दिवसात वास्तविक जगातल्या सामान्य लोकांच्या जीवनात पैसा काय चीज असते,ते तुला कळेल.जगात पुष्कळसे घातपात,

घटस्फोट,अविश्वास,तणाव याचे कारण पैसा या विषयीच्या समजुतीचा अभाव हे असते. या कल्पना तुला अजिबात ओळखीच्या वाटणार नाहीत (कळणार ही नाहीत),कारण आपण सहजपणे श्वासोच्छ्वास करून हवा घेतो तशा सहजपणे तुला पैसा मिळलाय.फक्त पुढचा श्वास घेत रहायचं एवढंच करायचं."


"तू पैशाची बऱ्यापैकी उधळपट्टी केली आहेस,हे मला माहीत आहे.त्याची जबाबदारी माझ्यावरच येते.त्याचं कारण मीच आहे,कारण काम आणि पैसा यांच्या विनिमयाचं नातं समजण्यापासून मी तुला वंचित ठेवलं. गेल्या महिनाभरात अगदी मामुली कामही नीट केलं तर, त्यापासून जे समाधान आणि अभिमान प्राप्त होतो त्याची लज्जत तुला चाखायला मिळाली.

बऱ्याच लोकांच्या कष्टांमध्ये पैशाचा उगम असतो.मला वाटतं, तुला हे समजू लागायला पाहिजे."


"गेल्या महिन्यात तू जे काम केलंस त्याबद्दल गस् कॉल्डवेलने तुला पैसे दिले असतील,तर तुला साधारण पंधराशे डॉलर मिळाले असतील.तुझ्या दृष्टिने ती मामुली,असून नसल्यासारखीच रक्कम असेल.पण तुला विश्वासाने सांगतो की हाच सध्याचा दर आहे.आज तू निघशील तेव्हा मिस्टर हॅमिल्टन तुला एक लिफाफा देतील.त्यात पंधराशे डॉलर्स आहेत.येत्या महिन्यात तू अशा पाच व्यक्ती निवडायच्या की या पंधराशे डॉलर्स पैकी काही रक्कम त्यांना दिली तर त्यांच्या आयुष्यात खरोखर फरक पडणार आहे.मला तुझ्या हे लक्षात आणून द्यायचं आहे,की पैशाची कमतरता आणि त्यामुळे असलेली चिंता यांचा त्यांच्यावर काय परिणाम होतो,एकदा का तू त्यांना पैसे दिलेस म्हणजे बघ त्यांच्या जीवनातल्या खऱ्या प्रश्नांवर त्यांना कसं लक्ष केन्द्रीत करता येतं "


"मला ठाऊक आहे आपले मित्र म्हणवणाऱ्यांच्या समवेत काही तासातच पंधराशे डॉलर्स उडवलेस तू.तेच पंधराशे डॉलर्स व्यवस्थितपणे वापरले तर काय होतं हे तू समजण्याची वेळ आली आहे."


"महिन्याच्या शेवटी तू मिस्टर हॅमिल्टनला अहवाल देशील.पाच प्रसंग असे सांगायचे की परिस्थिती काय होती आणि त्याबाबत तू काय कृती केलीस.पैसा ही एक देणगी आहे हा धडा तू शिकलास असे मिस्टर हॅमिल्टनना वाटले तर पुढच्या महिन्यात मी तुला भेटेन."पडद्यावरून रेडची प्रतिमा हळूहळू लुप्त झाली.आम्ही थोडा वेळ गप्प बसलो.नंतर जेसन माझ्याकडे वळून म्हणाला, "मी काय करायचं ते मला समजलंय असं वाटत नाही.मला कुठे अशी माणसं सापडणार आणि कसं काय...." त्याला थांबवत मी म्हटलं,"अरे,तू जसं ऐकलंस तसंच मी ऐकलंय,त्याच सूचना.आणखी जास्त माहिती किंवा मदत देण्याचा मला अधिकार नाही.तुझा काका तुला जे धडे शिकवण्याचा प्रयत्न करतोय त्यातला हा धडा पण तुझा तुलाच शिकावा लागणार आहे रेड स्टीव्हन्स मोठा माणूस होता याची खात्री मी तुला देतो.आणि तू यशस्वी व्हावंस म्हणूनच तुला सर्व काही दिलंय."


रेडने सांगितल्याप्रमाणे खोक्यात एक पाकीट होते.ते काढून जेसनच्या हातात देत मी म्हटलं,"पुढच्या महिन्याच्या शेवटी किंवा त्याआधीच आम्ही तुझ्या भेटीची वाट बघतो."


गोंधळलेल्या चेहऱ्याने जेसन हळूहळू उठला.वळून दाराकडे गेला.काही वेळ मी आणि मिस हेस्टिंग्ज कॉन्फरन्स रूममध्ये थांबलो. शेवटी शांततेचा भंग करत ती म्हणाली,पाकिटातल्या त्या पैशाचं नक्की काय करायच हे त्याला नीट समजलय असं नाही वाटत मला.क्षणभर थांबून मी म्हटलं,"पैशांबद्दल आपण वर्षानुवर्षे शिकत आलोय.जेसन या शाळेत नवखा आहे.

त्याला खूप भरपाई करायची आहे."


पुढच्या महिन्याच्या शेवटी जेसनने संपर्क साधला.मी कबूल करतो की त्याच्या प्रगतीबद्दल मी साशंक होतो. दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ जेसनने ठरवून घेतली. ठरलेल्या वेळी जेसनला आदबीने घेऊन मागरिट माझ्या ऑफिसमध्ये आली.ती आणि जेसन माझ्या समोरच्या चामड्याने वेष्टित केलेल्या खुर्ध्यावर बसले.


जेसन जरा भांबावल्यासारखा दिसला.थोडा वेळ मी थबकलो.एका महिन्यात पाच जण शोधून पैशांच्या सहाय्याने त्यांच्या आयुष्यावर सकारात्मक परिणाम करायला मला सांगितलं असतं तर मी काय केलं असतं असा विचार मनात आला.रेड स्टीव्हन्सचा कायदेशीर सल्लागार आणि इच्छापत्राचा व्यवस्थापक या माझ्या भूमिकेत मी शिरलो.करारपत्रात लिहिल्याप्रमाणे जेसनच्या हातून काही घडलं नसेल तर मला हा प्रवास तेथेच थांबवावा लागणार होता.जेसनच्या बाजूने बोलायचे झाले तर असं घडावसं वाटत नव्हते.आणि मी मान्य करतो की माझ्याही दृष्टिने तसे व्हायला नको होते.


शेवटी मी जेसनकडे वळून म्हणालो, "काय गड्या, रिपोर्ट द्यायची तयारी झालीय ना तुझी ?"


जेसनने मान हलवली आणि जाकिटाच्या आतल्या खिशातून एक चुरगळलेला कागद काढला.घसा साफ करून हळूहळू तो बोलायला लागला,"हे बरोबर आहे की नाही याची मला खात्री नाही.पण हे असं आहे खरं."


एकदा जरा उशिरा संध्याकाळी पार्किंग जागेत फंड जमा करण्यासाठी गाड्या धुणारी मुले दिसली.अंधार व्हायला लागला होता.त्यावरून त्यांचे दिवसाचे काम संपत आले असावे असा मी अंदाज केला.त्यांच्या व्यवस्थापकाला बोलावून चौकशी केली.ही मुले कोण आणि कशासाठी फंड गोळा करताहेत असं विचारल्यावर त्याने सांगितले की ती स्काऊटमधली मुले होती.

पुढच्या आठवड्यात त्यांना त्यांच्या जांबोरीला जायचे होते.फंड गोळा करण्याचा तो शेवटचा दिवस होता.आणि फंड थोडा कमी जमा झाला होता.परिणामी एक दोन मुलांना जाता येणार नव्हते.

म्हणून ती मुलं जरा निराश झाली होती. ठरवलेल्या रकमेपेक्षा किती पैसे कमी पडताहेत ते मी त्यांना विचारले. दोनशे डॉलरची तुट आहे असे त्यांनी खालच्या सुरात सांगितले.त्यांना ती जागा दहा मिनिटांत सोडावी लागणार होती.ठरावीक जागेत मी माझी गाडी उभी केली आणि मुलांना झटून काम करायला सांगितले,

त्यांची वेळ संपल्यावर मी एका मुलाजवळ दोनशे डॉलर्स दिले आणि गाडी घेऊन निघून गेलो


माझ्या संमतीच्या अपेक्षेने जेसनने माझ्याकडे पाहिले. त्याने पुढे चालू ठेवावे म्हणून मी फक्त मान हलवली.तो जरी चाचरत होता तरी कागदावर नजर टाकल्याने त्याला प्रोत्साहन मिळाले होते.पुढे मी एका मॉलमध्ये जाऊन गाडी पार्क करण्यासाठी जागा बघत होतो.एका जुन्या गाडीपुढे एक तरूणी छोट्या बाळाला घेऊन उभी होती.तिच्या मागे गाड्या घेऊन जाणारा ट्रक उभा होता. ट्रकच्या तरूण ड्रायव्हरला ती तरूणी मोठ्या आवाजात काही सांगत होती.त्या दोघांचा वाद चालू असताना मी माझ्या गाडीतून तिथे पोचलो.थांबून काय चाललंय असं त्याना विचारताच तो तरूण म्हणाला की जुन्या गाड्या हफ्त्याने देणाऱ्या एबीसी देणाऱ्या एबीसी कंपनीत तो नोकरीला होता.त्या तरुणीने कर्जाचे दोन हफ्ते चुकविले होते.महिन्याला शंभर डॉलर्स असा हप्ता होता तसल्या टपराट गाडीसाठी.ती तरुणी रडत सांगू लागली की तिचे छोटे बाळ आजारी होते.तिची गाडी काढून घेतली असती तर तिला नोकरीला मुकावं लागणार होते. मग काय झालं असतं ते तिला काय माहीत ? किती कर्ज आहे तिच्या नावावर असे मी ट्रक ड्रायव्हरला विचारता प्रत्येकी शंभर डॉलर्सचे चार हफ्ते तिच्याकडून येणे असल्याचे त्याने सांगितले.मी त्याला चारशे डॉलर्स दिले. आणि पूर्ण रक्कम भरली गेल्याची पावती त्या तरूण आईलां देववली.ही बघा त्याची प्रत."


सर्वोत्तम देणगी,जिम स्टोव्हॅल 


चुरगळलेली आणि दमट झालेली एक पावती त्याने डेस्कच्या काठावर ठेवली.त्याने बोलणे चालू ठेवले."मी मॉलमध्ये होतो तेव्हा एक तरूण,त्याची बायको आणि दोन छोटी मुले खेळण्यांच्या विभागात खरेदीसाठी घुटमळत होती.प्रत्येक मूल पुन्हापुन्हा विविध खेळण्यांची मागणी करत होते.आईवडील त्यांना सांगत होते की बहुधा यंदा सांताक्लॉज येणार नाही.कारण त्यांच्या वडिलांची नोकरी सुटली होती.दुसऱ्या दालनात मुले भुसा भरलेल्या प्राण्यांकडे बघत होती तेव्हा मी त्यांच्या आईजवळ जाऊन तीनशे डॉलर्स दिले आणि बजावले की यंदा सांताक्लॉज त्यांच्या घरी जरूर येणार आहे,नाही कसा ?मी मॉलमधून बाहेर पडत होतो तेव्हा माझ लक्ष बाकावर बसलेल्या एका म्हाताऱ्या बाईकडे गेले.मी जवळून जात होतो तेव्हा तिची पर्स खाली पडली.मी उचलून तिला दिली.ती रडत असल्याचं मी पाहिलं.तिला कारण विचारलं तेव्हा तिनं सांगितलं की ती आणि हॅरॉल्डने सत्तावन्न वर्षाचे वैवाहिक जीवन घालवले होते.आणि आयुष्यात प्रथमच कस जगायचं ही पंचाईत आली आहे.त्यांच्या हृदयासाठी घ्यायच्या गोळ्यांसाठी दरमहा साठ डॉलर्स लागतात.मॉलमधला औषधविक्रेता तिची अन्नाची कपन स्वीकारून त्याबदल्यात औषधे देत नाही आहे.दोनशे डॉलर्स खर्च करून मी हॅरॉल्डची तीन महिन्यांची औषधे घेतली. आणि वीस डॉलर्स उरले ते मी तिला देऊन त्यांचा आवडीचा खाद्यपदार्थ घेण्यास सांगितले.


जेसनने माझ्याकडे अपेक्षेने पाहिले.मी हसलो आणि त्याला म्हणालो,"हे सारं ठीक आहे.पण तुला पाच उदाहरणं आणण्याची सूचना होती."


जेसन नेहमीपेक्षा नर्व्हस वाटला.तो म्हणाला,"एक दिवस गाडी चालवत असतांना रस्त्याच्या कडेला मी एक मोडकी गाडी पाहिली.मी बाहेर येऊन पाहिलं आणि ब्रायन नावाच्या एका तरूणाला भेटलो.तो जवळ जवळ माझ्याच वयाचा आहे.आम्हा दोघांमध्ये बऱ्याच समान गोष्टी आहेत असं आम्हाला आढळलं.मी माझ्या मोबाईलचा उपयोग करून गाडी ओढून नेणाऱ्या एका ट्रकला बोलावलं.त्यानी गाडी गॅरेजमध्ये नेली.तिथल्या दुरूस्ती करणाऱ्या मेकॅनिकने सांगितले की मशीन पार बिघडलं आहे आणि बदली करायला पाहिजे.ब्रायन अगदी घाबरून गेला.कारण त्याला शाळा आणि घर यामध्ये जा-ये करायला गाडीची गरज असायची. सातशे डॉलर्स खर्च येईल असे मेकॅनिकने सांगितले. ब्रायनला शॉक बसला कारण त्याच्याजवळ पैसे नव्हतेच.मी त्याला नवीन इंजिन घालायला लागणारे सातशे डॉलर्स दिले.


सदा तत्पर असणारी मिस हेस्टिंग्ज कापऱ्या आवाजात म्हणाली,

"सर याची बेरीज तर अठराशे डॉलर होते. मुळच्या पत्राप्रमाणे तर पंधराशे डॉलर्सचाच विनियोग करायचा होता."जेसन घाबराघुबरा होऊन खुर्चीत थोडा पुढे वाकून म्हणाला,"माझ्या पदरचे तीनशे डॉलर्स मी घातले.हरकत नाही ना?"


मला बोलायला अवसरही न देता मिस् हेस्टिंग्ज म्हणाली, "हो तर,बेशक.मिस्टर हॅमिल्टन उमदा आणि समजूतदार माणूस आहे." माझ्याकडे पहात म्हणाली, "हो ना,मिस्टर हॅमिल्टन ?"


न वाकणारी मागरिट आणि जेसन यांना मी उमदा आणि समजूतदार असल्याची खातरजमा दिली.आणि जेसन पैशाचे मोल हा महत्वाचा धडा शिकला.तो आपला धडा कधीच विसरणार नाही अशी आशा मला वाटली.मी पण कधी विसरणार नव्हतो.

१५/७/२५

उत्क्रांतीकडे वाटचाल \ Move towards evolution

यापूर्वी क्रिएशनच्या वेळी सगळे जीव एकदम तयार झाले असं चर्च सांगत होतं,तर काही लोक घाणीतून,सडलेल्या मांसातून जीव तयार होतात असंही म्हणत होते.लॅमार्क चूक असला तरी या सगळ्यांपेक्षा वेगळं आणि निदान जास्त तर्कवादी तरी बोलत होता.


सस्तन प्राणी,पक्षी,सरीसृप (सरपटणारे) प्राणी आणि मासे ही लिनियसनं मानलेले पहिले चार क्लासेस लॅमार्कनं एकाच 'व्हर्टिब्रेट' म्हणजेच 'पाठीचा कणा असलेल्या' या गटात टाकले. लिनियसनं मानलेल्या कीटक आणि वर्म्स या इतर दोन क्लासेसना लॅमार्कनं 'इनव्हर्टिब्रेट' या दुसऱ्या गटात टाकलं.वर्गीकरणाची ही पद्धत लवकरच प्रसिद्ध झाली.

याशिवाय,त्यानं आठ पायांच्या कोळ्यांना सहा पायांच्या कीटकांच्या गटात टाकणं किंवा लॉब्स्टरनं स्टारफिशच्या गटात टाकणं योग्य नाही हे सांगितलं.


१८१५ ते १८२२ च्या दरम्यान लॅमार्कनं 'नॅचरल हिस्ट्री ऑफ इनव्हर्टिब्रेट्स' हा सात खंडांचा मोठा ग्रंथच लिहिला.या खंडानं आधुनिक 'इनव्हर्टिब्रेट झूऑलॉजी'चा पाया घातला.

या विषयाचा अभ्यास करतानाच खरं तर त्याच्या डोक्यात उत्क्रांतीची कल्पना आली होती.त्याबद्दल त्यानं आपल्या १८०१ साली प्रकाशित झालेल्या पुस्तकात लिहिलं होतंच.


यानंतर १८०९ साली लॅमार्कनं 'झूऑलॉजिकल फिलॉसॉफी' लिहिलं.त्यात त्यानं तीन मुद्दे मांडले. एक म्हणजे जीव हे सतत शिडीतल्या खालच्या पायरीवरून वरच्या पायरीवर जाण्याचा प्रयत्न करतात. याच प्रक्रियेत मग साध्या जिवातून जास्त गुंतागुंतीच्या वरच्या दर्जाचे जीव कालांतरानं तयार होतात.दुसरा म्हणजे सभोवतालच्या परिस्थितीमुळे प्राणी काही अवयव जास्त वापरतो. ते मग बळकट होतात. उदाहरणार्थ, जिराफ उंच झाडांवरची पानं खाण्यासाठी मान उंच करतो आणि त्याची मान उंच होत जाते.प्राणी जे अवयव भरपूर वापरतात ते अवयव आकारानं आणि क्षमतेनं वाढतात आणि जे अवयव वापरत नाहीत ते नष्ट होतात.

आणि हे अवयवांचं वाढणं किंवा नष्ट होणं पुढच्या पिढ्यांमध्ये संक्रमित केलं जातं.हे आपल्या पुस्तकांत लॅमार्कनं सांगितलं होतं.हे समजावताना त्यानं त्या काळी नव्यानंच लक्षात आलेल्या जिराफाचं उदाहरण दिलं होतं.


हा प्राथमिक प्राणी अँटेलोप झाडाची पानं खाऊन जगायचा.

नंतर खालच्या भागातली पानं संपल्यामुळे आणखी आणखी वरच्या भागातली पानं खायला तो आपली मान उंच ताणत राहिला, त्यानं आपली जीभ आणि पायही लांब ताणले आणि यातूनच मान,पाय आणि जीभ हे अवयव लांब झाले आणि हेच गुण प्रत्येक पुढच्या पिढ्यांमध्ये संक्रमित होत राहिले आणि पुढची पिढी आधीच्या पिढीपेक्षा उंच निपजणं आणि त्यांनी मान आणि पाय आणखी ताणणं यातूनच अँटेलोपपासून जिराफ निर्माण झाला.


पण असे एका पिढीनं अवगत केलेले कोणतेही गुण असे पुढच्या पिढीत संक्रमित होतात या गोष्टीला सबळ पुरावा नसल्यामुळे ही थिअरी फारशी काही चालली नाही.त्या उलट एका पिढीनं अवगत केलेले गुण पुढच्या पिढीत संक्रमित केले जात नाहीत,हेच त्या वेळचे पुरावे दाखवत होते.


तिसरा म्हणजे एका पिढीत कमावलेले गुणधर्म हे पुढच्या पिढीत वारसांना मिळतात.


माणूसही एपपासून निर्माण झाला असं लॅमार्क म्हणे.त्याच्या मते केव्हातरी एप झाडावरून खाली उतरून सरळ चालायला लागला आणि मग त्यानं माणसाचे गुणधर्म उचलले.यानंतर त्याला मुलं झाली तेव्हा पुढच्या पिढीतही ते मानवी गुण अवतरले आणि मग असं करत करत मनुष्यजात निर्माण झाली,असं लॅमार्क म्हणे.लॅमार्कचं म्हणणं त्या काळी खूप लोकांना पटलं,अगदी डार्विनपर्यंत. पण मग सगळंच बदललं आणि मग लोक त्याची टिंगल करायला लागले.


माणूस एपपासून निर्माण झाला हे लॅमार्कचं म्हणणं बरोबर असलं तरी या आयुष्यात कमावलेले गुण पुढच्या पिढीत जातात हे त्याचं म्हणणं मात्र नक्कीच चूक होतं.व्यायाम करून शरीर कमावलेल्याला झालेली मुलं काही दंडाचा गोळा घेऊनच जन्माला येत नाहीत.ऑगस्ट वीझमन या जर्मन प्राणिशास्त्रज्ञानं हे तपासण्यासाठी एक विचित्रच प्रयोग केला.त्यानं उंदरांच्या शेपट्या कापल्या आणि नवीन पिढीत उंदीर कापलेली किंवा आखूड शेपटीच घेऊन जन्माला येतात,की नाही हे उंदरांच्या अनेक पिढ्या शेपट्या कापून तपासलं.पण त्याला नवीन पिढीतल्या उंदरांच्या शेपट्या तशाच लांब सापडल्या.म्हणजे एका पिढीत कमावलेले किंवा गमावलेले गुणधर्म नवीन पिढीवर परिणाम करत नाहीत हे सिद्ध झालं.पण लॅमार्कची ही चूक जरी झाली असली तरी उत्क्रांतिवादाची ही एका अर्थानं सुरुवात लॅमार्कनंच केली होती! अर्थात,उत्क्रांतीची थोडीशी कुणकुण त्याला या पुस्तकात लागली असली तरी त्यानं उत्क्रांती अशा अर्थाचा शब्द त्या पुस्तकात वापरला नव्हता हे विशेष !


लॅमार्कनं ही थिअरी मांडल्यावर लॅमार्क आणि कुव्हिए यांच्यात वादावादी सुरू झाली.ती अगदी विकोपाला जाऊन पोहोचली.इतकी की शेवटी जेव्हा लॅमार्क आंधळा झाला तेव्हाही कुव्हिए ओरडला,लॅमार्कनं निसर्गाकडे नीट नजरेनं किंवा स्वच्छ डोळ्यांनी बघितलं नसल्यानंच निसर्गानं त्याचे डोळे काढून घेतले असले पाहिजेत !


लॅमार्कनं चार लग्नं केली.वयाच्या सत्तरीत त्याची दृष्टी गेली.त्या वेळेपर्यंत अनेक कारणानं त्याच्याकडचे पैसेही संपले होते.अत्यंत दरिद्री अवस्थेत तो आपल्या मुलीजवळ राहायला लागला. १८ डिसेंबर १८२९ रोजी तो वारला तेव्हा त्याच्या कुटुंबाची एवढी दयनीय अवस्था होती,की त्याला पुरायला शवपेटीही विकत घेता येईना.घरची चीजवस्तू आणि त्याच्या पुस्तकांचा लिलाव करून पाच वर्षांसाठी भाड्याने शवपेटी घेऊन पुरण्याची व्यवस्था मग कशीबशी झाली!पण कालांतरानं मात्र लीज संपल्यावर त्याचे अवशेष उकरून कचऱ्यात कचऱ्यात फेकण्यात आले आणि ती जागा दुसऱ्याला पुरण्यासाठी दिली गेली.लॅमार्कची परवड त्याच्या मरणानंतर त्याच्या अवशेषांच्याही वाट्याला आली होती!लॅमार्क दरिद्री आणि दर्लक्षित अवस्थेत मरण पावला.त्याची थिअरीही अनावश्यक अवयवांप्रमाणे आक्रसून गेली.पण या पार्श्वभूमीनं उत्क्रांतीच्या संकल्पनेला मात्र अनुकूल वातावरणनिर्मिती केली हे मात्र खरं.


विसाव्या शतकात पुन्हा जवळपास लॅमार्कचीच थिअरी रशियात लिसेंको नावाच्या शास्त्रज्ञानं पुढे आणली.कुठल्याही माणसाचे गुणधर्म हे आनुवांशिक असतात तसेच ते भोवतालच्या परिस्थितीप्रमाणेही बदलतात.पण ते फक्त बाह्य परिस्थितीप्रमाणेच बदलतात असा चुकीचा अर्थ लावण्यात आला.म्हणून बाह्य परिस्थितीमुळे प्राण्याचे गुणधर्म नुसतेच बदलत नाहीत तर ते पुढच्याही पिढीत जाऊ शकतात असंच लॅमार्कसारखं लिसेंको बोलायला लागला.


लॅमार्कच्या थिअरीज हाणून पाडण्यात कुव्हिएचाच मोठा हात होता.त्या काळातला कुव्हिए हा मोठा शास्त्रज्ञ तर समजला जायचाच,पण राजकारणातही तो चाणाक्ष असल्यामुळे त्यानं महत्त्वाची पदंही पटकावली होती.कुव्हिएची निरीक्षणं अचूक असत.तो झोपेतही अनेक प्राण्यांविषयी अस्खलितपणे बोलू शकत असे असं म्हणतात.एका (दंत) कथेप्रमाणे जरा जास्तच दारू प्यायल्यावर तो जेव्हा झोपला होता,तेव्हा त्याला घाबरवून टाकून गंमत करण्यासाठी काही विद्यार्थी मुद्दामहून कुव्हिएच्या पलंगापाशी शिंगासारखं काहीतरी लावून आले आणि म्हणाले,'कुव्हिए, कुव्हिए,आम्ही तुला खायला आलो आहोत.' तेव्हा कुव्हिए अर्धवट झोपेतच,किलकिल्या डोळ्यांनी त्यांच्याकडे बघत म्हणाला, 'शिंगं असणारी जनावरं ही शाकाहारीच असतात,तुम्ही मला मारूच शकणार नाही' आणि एवढं बोलून तो पुन्हा चक्क झोपून गेला! ते विद्यार्थी अवाक होऊन बघतच बसले !


फ्रेंच अ‍ॅकॅडमीनं शब्दकोश बनवण्यासाठी निर्माण केलेल्या कमिटीतल्या कुणीतरी खेकड्याची व्याख्या लाल असणारा,

उलट दिशेनं चालणारा मासा अशी केली होती.कुव्हिएनं लगेच आपलं मत त्यावर व्यक्त केलं.तो म्हणाला,तीन गोष्टी सोडल्या तर ही व्याख्या बरोबर आहे.एक तर खेकडा लाल नसतो,तो उलट दिशेनं चालत नाही आणि तो मासा नाही.खरं तर लॅमार्क आणि कुव्हिए हे दोघंही चुकले होतेच.पण त्यांनी उत्क्रांतिवादाचा पाया घातला हे मात्र नाकारता येत नाही.


१३.०७.२५ या लेखातील दुसरा शेवटचा भाग…