* विजय गायकवाड | Vijay Gaikawad

live

नमस्कार आपले स्वागत आहे. मी पुस्तके आणि मित्रांवर पैसे खर्च करतो,माझ्याकडे दगड आणि विटांवर खर्च करण्यासाठी पैसे नाहीत.- रस्किन बाँड.ही थोर माणसं व त्यांचे विचार मला पुस्तकात भेटलीत.ती भेटली आणि त्यांनी सांगितले कि, प्रत्येक दिवशी असं काही तरी करा की,ते तुम्हाला अधिक सुंदर उद्याच्या दिशेने खूप लांबवर घेऊन जाईल."- डोग फायरबाऊ.' सर्वियन कादंबरीकार मिलोराद पावीच यांचे एक वाक्य आहे ते म्हणतात - जोवर जगात पुस्तक वाचणाऱ्या वाचकांची संख्या बंदूकधारी सैनिका पेक्षा अधिक आहे तोवर काळजीच काहीच कारण नाही.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात.पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये.म्हणून अविरतपणे प्रयत्न करणारे मार्गदर्शक, मित्र धावून येतात.प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,डॉ.दीपक शेटे,आ.भरत बुटाले,प्रा.सर्जेराव राऊत,सुभाष ढगे,अनिल फारणे,डॉ.सुधीर सरवदे ,विश्वास खाडे, विनायक पाटील,संजय कुंभार,सतीश खाडे,मनोहर सुर्वे,गणेश खंदारे,तात्या गाडेकर, दादासाहेब गाडेकर, दादासाहेब ताजणे, पुस्तकातील घटना प्रसंग सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील यांनी केलेले आहे. मला लिहिण्याची प्रेरणा देणारी पुस्तके,लेखक,प्रकाशक,मित्र ही जगावेगळी माणसं माझ्या जीवनातील महत्वाचा टप्पा आहेत.... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ.मेघा गायकवाड, चिरंजीव मयान,माझ्या धावण्यातील गुरुवर्य नामदेव बरुरे,लुल्ला शेख मोठी ताई ,लहान ताई जयश्री शिंदे या सर्वांचेच मनापासून आभार व धन्यवाद मॅट्रिक फेल विजय गायकवाड

२४/११/२५

चक्रवर्ती / Chakraborty


गावाबाहेरच्या तळ्याच्या बाजूला एक पाच फूट…अपुरे राहिलेला भाग पुढे सुरु…


उंच देव्हारा बांधून त्यात त्या देवाची प्रतिष्ठापना केली. गावकरी लांबूनच बघत होते.हळू आवाजात चर्चा करत होते.देवाच्यानंतर नंबर होता पिंपळाचा.त्यादिवशी मात्र गाव कर्फ्यू लागल्यासारखं घरात बसून राह्यलं. कॉन्ट्रॅक्टरच्या माणसांव्यतिरिक्त फक्त चक्रवर्ती डॉक्टरदाम्पत्य हजर होतं.डॉ.पटेलांनीही येणं टाळलं होतं.पिंपळ तोडायला बारा मजूर आणि बारा तास लागले.नवीनबाबूंच्या सल्ल्याप्रमाणे कॉन्ट्रॅक्टरने तीन मोठे ट्रक आणून ठेवले होते.

त्यातूनच त्या प्रचंड वृक्षाचे अवशेष गावातून बाहेर काढले.

नवीनबाबूंना ते तोडलेलं झाड बघून त्यावर होणारी लोकांची चर्चा टाळायची होती.एवढं करूनही पुढचे पंधरा दिवस सगळा गाव त्याबद्दल दब्या आवाजात चर्चा करतच होता.


पिंपळाजवळ मजूर नि डॉक्टर दाम्पत्याशिवाय कुणीही हजर नसतानाही एक अफवा वणव्यासारखी गावभर पसरली - पिंपळावर कुऱ्हाडीचा पहिला घाव बसताच रक्ताची चिळकांडी उडाली म्हणे ! कुणी सांगत होता - कुऱ्हाडीच्या प्रत्येक घावाबरोबर कण्हण्याचा आवाज झाडातून येत होता...!


पिंपळ तोडताना उडालेला अफवांचा धुरळा हळूहळू खाली बसू लागला.चक्रवर्तीच्या बंगल्याचं काम पूर्णत्वाकडे पोहचायला लागलं.दुर्गापूजेच्या आठवडाभर आधी नवीन बंगल्यात राहायला जायचं आहे हे नवीनबाबूंनी बजावलंच होतं.एकीकडे बंगल्यातल्या आणि दवाखान्यातल्या फर्निचरचंही काम चालू होतं. बंगल्याचं काम सुरू होताच दवाखान्यासाठी लागणारी अत्याधुनिक उपकरणं मागवली गेली.आता गावकऱ्यांच्या भीतीचं आणि काळजीचं रूपांतर औत्सुक्य आणि कौतुकात झालं होतं तरीही पारावरचा तो देव नि पुरातन पिंपळ लोकांच्या मनात मधूनच डोकावत होते.शेवटी एकदाचं बंगल्याचं काम संपलं.


दवाखान्याचं उ‌द्घाटन डॉ.पटेल ह्यांच्याच हस्ते नवीनबाबूंनी केलं आणि दवाखाना सुरू केला. दवाखान्यात पहिल्यासारखी गर्दी होऊ लागली.इतका चकाचक दवाखाना,मुंबईहून आणलेली भारी मशिनरी... त्यामुळे डॉक्टरांचे धर्मादाय दवाखान्यासारखे मोफत उपचार तर सोडाच पण फी भरपूर असणार,बहुदा ती आपल्याला परवडणारी नसेल असा बहुतेकांचा समज झाला.पण दवाखान्यात गेल्यावर त्यांना धक्काच बसला ! पेशंटना बसण्यासाठी असलेल्या जागेत एका कोपऱ्यात एक लाकडी बॉक्स ठेवलेला होता.त्यावर ना दोन्ही डॉक्टरांची नजर होती ना दवाखान्यातल्या कर्मचाऱ्यांची.त्या बॉक्सवर पाटी लावली होती -


तुम्हाला परवडत असेल तरच आणि तेवढीच फी ह्या बॉक्समध्ये टाकावी.


सगळ्यांनीच ह्या उपक्रमाचं स्वागत केलं.नवलाची गोष्ट म्हणजे वेटिंगरूममध्ये बसलेले इतर पेशंट्स बाहेर जाणारी व्यक्ती त्या पेटीत पैसे टाकते की नाही ह्यावर लक्ष ठेवायचे.

काही चिकित्सक मंडळी तर कोण किती पैसे टाकतं हयावरही लक्ष ठेवायची.


दवाखाना नवीन जागेत सुरू झाल्यावर पहिल्या आठवड्यातच एका अडलेल्या बाळंतिणीची केस आली. तोपर्यंत आजूबाजूच्या गावातही सुईणीच बाळंतपण करायच्या.त्या आपल्या कामात पारंगत असत. त्यातल्या त्यात सावित्रीबाई तर फारच हुशार होत्या. त्यांच्याविषयीची एक गोष्ट लोक आवर्जून सांगतात -


एकदा सावित्रीबाई एका प्रतिष्ठित घरातल्या सुनेच्या बाळंतपणासाठी गेल्या होत्या.बाळाची जन्मवेळ जवळ यायला लागली आणि बाळ पायाळू जन्मणार अशी चिन्हं दिसायला लागली.कुटुंबप्रमुख स्त्री काळजीत पडली.

सावित्रीबाईंनी एक उदबत्ती मागवली आणि नवजाताच्या अस्पष्ट दिसणाऱ्या पायाच्या अंगठ्याला ती जळती उदबत्ती निमिषमात्र टेकवली.गर्भाशयातल्या बाळाने पटकन् पाय आत ओढून घेतला आणि ते गर्रकन् पोटातल्या पोटात फिरलं.बाळ पायाळू न होता कुटुंबाला हवं तसं नॉर्मल जन्मलं.चिंतेचं कारण उरलं नाही !


तर अशा ह्या कुशल सावित्रीबाईंनीही त्या अडलेल्या बाळंतिणीच्या केसपुढे हात टेकले होते.अशा अवस्थेत जिल्हयाच्या दवाखान्यात नेणंही अशक्य होतं.त्या काळात तिथेही सिझेरियनच्या केसेस दुर्मिळ होत्या आणि गावात तर अशी एकही केस झाली नव्हती. अशावेळी त्या चिंताग्रस्त कुटुंबाला डॉ.शामलींची आठवण झाली.ते ताबडतोब त्या अडलेल्या बाळंतिणीला घेऊन डॉ.

शामलींच्या दवाखान्यात आले. अमेरिकेत शिकलेल्या आणि प्रॅक्टिस केलेल्या डॉ. शामलींसाठी ही केस अगदीच किरकोळ होती. बाळंतिणीची सुखरूप सुटका झाली.बाळंतिणीच्या कुटुंबाला इतका आनंद झाला आणि त्यांना इतकी कृतज्ञता वाटली की,ते अख्खं कुटुंब डॉ.शामलींच्या पाया पडायला लागलं.त्यांच्या कुटुंबप्रमुखाने फी विचारली तर डॉ.शामलींनी कोपऱ्यात ठेवलेल्या त्या बॉक्सकडे बोट दाखवलं.


ह्या केसनंतर डॉ.शामलींच्या कौतुकाच्या वर्षावात लोकांच्या मनातली पिंपळाची ती उरलीसुरली सावलीही नाहीशी झाली.खेड्यापाड्याच्या अडाणी बायका तर 'डागतरीन बाईला देवाचं वरदान आहे' असं मानायला लागल्या.

एकमेकींशी बोलताना त्या असा उल्लेख करून म्हणत,


"बय गं,आक्रीतच झालं ! बाईचं पोट फाडून पोर बाहेर काढलं अन् पोट परत शिवून बी टाकलं..."


ह्या प्रसंगानंतर गावातल्या तरुणींची तर डॉ.शामली नायिकाच झाल्या.अनेक बाबतींत त्यांचं अनुकरण होऊ लागलं.भांगात कुंकू भरण्याची फॅशन गावच्या विवाहित स्त्रियांमध्ये आली.कळस म्हणजे भडक लाल,हिरव्या, भगव्या रंगाच्या बॉर्डर असलेल्या पांढऱ्या आणि मोतीया रंगाच्या रेशमी साड्या एका हुशार दुकानदाराने 'शामली साडी' अशी जाहिरात करून विकायला सुरुवात केली !


एकंदरीत नवीनबाबू,शामली हे डॉक्टरद्वय ह्या लहानशा गावात रमले.रुळले.स्वतःकडे पाहायला आता त्यांना वेळ मिळू लागला होता.लोकांना विश्वासात घेऊन दवाखाना शनिवारी अर्धावेळच उघडा ठेवायला त्यांनी सुरुवात केली.गावाच्या बाहेर मामलेदार कचेरीनंतर आणि कोर्टाच्या आधी एक क्लब होता.नवीनबाबू आणि अर्थातच शामलीदेखील क्लबच्या सभासद होऊन दर रविवारी सकाळी क्लबमध्ये टेनिस खेळायला जाऊ लागले.एकदा शनिवारी संध्याकाळी नवीनबाबू आणि शामली एसटी स्टँडला लागून असलेल्या रस्त्यावरून पुढे गावाबाहेर पायीपायी फिरायला चालले होते. रस्त्यावरून पुढे गावाबाहेर साधारण तीनेक फर्लांग गेल्यावर एक छोटासा गाडी रस्ता पुढे गेलेला त्यांना दिसला.तो पुढे कुठे तरी धानोरे नावाच्या गावाकडे जात होता म्हणे.दोन्ही रस्त्यांच्या तिठ्यावर एक अर्धवट बांधकाम दिसलं.पूर्ण झालेला जो भाग दिसत होता तो उत्कृष्ट होता.डॉ.शामली म्हणाल्या,"आपलं आत्ताचं घर भरवस्तीत आहे.दवाखान्याच्या जागेसाठी नक्कीच सोयीचं आहे.पण राहायला अशी एखादी रमणीय जागा हवी.ह्या जागेचा आकार थोडा विचित्र आहे.एकूण जागा त्रिकोणी आहे." ह्या जागेसंबंधीही हे डॉक्टरद्वय डॉ.पटेलांशी बोललं. पुढचा भाग साठ फुटापर्यंत आणि तो निमूळता होत शेपटासारख्या टोकाला जेमतेम दोन फूट झाला होता. अशा जागेला व्याघ्रमुखी जागा म्हणतात आणि ती राहायला अशुभ मानली जाते.असं डॉ.पटेलांनी त्यांना सांगितलं.ह्यावेळीसुद्धा दोघांनाही ती जागा आवडल्यामुळे ती त्यांनी घ्यायचं ठरवलं आणि आपल्या हौसेप्रमाणे बांधकाम पूर्ण करायला सुरुवात केली. ह्यावेळी 'जागा घेऊ नका' असा सल्ला मात्र गावातल्या कुणीच दिला नाही.


आता गावात येऊन डॉ.चक्रवर्तीद्वयांना एक वर्षं झालं होतं.ते त्यांच्या स्वतःच्या घरात राहयला गेले तेव्हा दुर्गापूजा जवळ आली होती.आता पुन्हा एकदा दुर्गापूजा आली.ही पूजा दणक्यात करायची असं ठरलं.दोघेही तयारीला लागले.बंगाली मिठाया बनवण्यासाठी बाहेरून आचारी बोलावले.सगळ्या बंगल्याला दीपमाळांनी सजवलं. गावातल्या काही खास जवळच्या लोकांना त्यांनी जेवायला बोलावलं.अगदी काटूनकुटून निमंत्रणं केली तरीही दीडशे माणसं झाली होती.इतर लोक संध्याकाळी प्रसादाला आणि नास्त्याला आले होते.


कार्यक्रम खूप धूमधडाक्यात झाला.नवीनबाबू पांढरा कुर्ता आणि बंगाली पद्धतीचं धोतर नेसून सोगा खांद्यावर टाकून लोकांचं आगत-स्वागत करत होते. लांब,काळेभोर केस मोकळे सोडलेल्या,

पांढऱ्या रेशमी साडीतल्या डॉ.शामली स्वतःच दुर्गा वाटत होत्या.डॉ. शामली विजेसारखी हालचाल करत सर्वत्र वावरत होत्या.बायाबापड्यांनी मनातल्या मनात हजारवेळा त्या दोघांची दृष्टी काढली.डॉक्टर पटेलांच्या पत्नीने तर शामलींना काजळाची लहानशी तीटसुद्धा लावली आणि अशीच तीट शामलींनी नवीनबाबूंना लावावी असंही सुचवलं.नवीनबाबू जरा थकलेले पाहून शामलींनी त्यांना विचारलं तेव्हा 'काही विशेष नाही' म्हणत त्यांनी शामलींचं बोलणं उडवून लावलं.आणखी तासाभराने मात्र ते शामलींना म्हणाले,"मी जरा वरती जाऊन पडतो. थोडीशी चक्कर आल्यासारखं वाटतंय.तू पाहुण्यांकडे बघ." डॉ.शामलींनी त्यांचं ब्लडप्रेशर बघितलं.ते अगदी व्यवस्थित होतं.त्यामुळे शामली खाली आल्या आणि पाहुण्यांमध्ये मिसळून गेल्या.


सगळ्यांचं हवं-नको बघून नंतर सर्वांना निरोप देऊन डॉ. शामली वर बेडरूममध्ये गेल्या तेव्हा नवीनबाबू तापाने फणफणलेले दिसले.अर्धवट झोपेत ते अधूनमधून कण्हत होते.डॉ.शामलींनी त्यांना पॅरासिटामॉल दिली. पांघरूण घालता घालता त्या म्हणाल्या,


"नवीन,तुझी खूपच धावपळ झालीय.श्रमाने ताप आलेला दिसतोय.उद्याचा दिवस आराम कर.खाली दवाखान्यातदेखील येऊ नकोस.तुझे पेशंट मी बघेन."


डॉ.नवीन ह्यांनी मान डोलवली आणि परत त्यांना ग्लानी आली.

डॉ.शामलीही थकून गेल्या होत्या.नवीनची झोपमोड होऊ नये म्हणून त्यांनी शेजारच्या बेडरूममध्ये जाऊन अंग टाकलं पण त्यांना झोप काही येईना डॉ. नवीन ह्यांना त्या लग्नाच्या आधीपासून ओळखत होत्या. दोघेही कलकत्त्यात शेजारीच राहत होते.आजपर्यंत डॉ. शामलींनी नवीनना आजारी पडलेलं पाहिलं नव्हतं. नियमित भरपूर व्यायाम करणाऱ्या दणदणीत प्रकृतीच्या नवीनना कधी साधा तापदेखील आलेला शामलींना आठवत नव्हता.रात्री मध्येच त्या नवीनच्या बेडरूमध्ये गेल्या.त्यांच्या कपाळाला हात लावून पाहिला तर त्यांचं संपूर्ण अंग घामाने डबडबलेलं होतं.हलकेच त्यांचा घाम टिपून त्यांना थोपटून शामली झोपायला गेल्या.दुसऱ्या दिवशी सकाळी नवीनचा ताप उतरला.

त्यांना फ्रेशपण वाटत होतं.पण शामलींनी त्यांना आराम करायला लावला.दोन दिवसांनंतर डॉ.नवीन ह्यांनी परत त्यांच्या नियमित आयुष्याला सुरुवात केली.पण साधारण आठवडाभराने त्यांना गळून गेल्यासारखं वाटलं म्हणून संध्याकाळचे त्यांचे पेशंट्स डॉ.शामलींनी तपासले.ह्या वेळेला नवीनना अधूनमधून चक्करही येत होती.दोन दिवस ते अंथरुणावरच होते.आता मात्र डॉ. शामलींना काळजी वाटू लागली.त्यांनी डॉ.पटेलांशी चर्चा केली आणि नवीनच्या सगळ्या टेस्ट्स केल्या. सगळ्या नॉर्मल आल्या पण नवीनचा बारीक ताप आणि थकवा काही कमी होत नव्हता.


हळूहळू नवीनचं वजन कमी होऊ लागलं.डोळ्यांभोवती काळी वर्तुळं दिसू लागली.शामली नवीनना घेऊन डॉ. पटेल ह्यांच्या सोबतीने मुंबईच्या प्रख्यात डॉक्टरांकडे गेल्या.पुन्हा सगळ्या टेस्ट्स झाल्या पण निदान काही झालं नाही.बारीक ताप असे पण थोडासाच.थकवा येतच होता.गावाबाहेरचा बंगला तयार झाला होता पण तो बघायला जायचा उत्साह शामलींना नव्हता.थोडा बदल व्हावा म्हणून त्यांनी नवीनबाबूंना आग्रह करून क्लबमध्ये नेलं.पण नवीनबाबूंना चक्कर येऊ लागली म्हणून पाच मिनिटांतच ते तिथून निघाले.आता गावकऱ्यांमध्येही डॉक्टरसाहेबांच्या प्रकृतीच्या चिंतेचं सावट पसरलं.ह्या देखण्या जोडप्याला कुणाची तरी दृष्ट लागली असंही त्यांना वाटू लागलं.


एक दिवस अचानक नवीनबाबू शामलीला म्हणाले,"आपण नवीन बंगल्यात राहायला जाऊ.गावाबाहेरच्या मोकळ्या हवेत कदाचित मला लवकर बरं वाटेल."


डॉ.पटेल ह्यांच्या कुटुंबीयांच्या मदतीने शामलींनी आवश्यक सामानासह नवीन बंगल्यात बस्तान हलवलं. दोन दिवस बरे गेले.पण नंतर परत पहिले पाढे पंचावन्न. सुरुवातीचे काही दिवस शामली तिथूनच दवाखान्यात येत-जात होत्या.पण त्यांची फारच धावपळ होऊ लागली होती.त्यामुळे डॉ.पटेलांना त्यांनी दवाखाना सांभाळण्याची विनंती केली आणि स्वतः नवीनबाबूंची सेवा करायला त्यांच्याबरोबर जास्तीत जास्त वेळ राहू लागल्या.

नवीनबाबू आता फारच खंगले होते.त्यांचे कपडे त्यांना ढगळ होऊ लागले होते.एक एक पाऊल टाकणं जड जात होतं.घरातल्या घरात ते व्हील चेअरवर फिरत.डॉ.शामली त्यांना सकाळी -संध्याकाळी बंगल्याच्या बागेत फिरवत असत.आपल्या डॉक्टरांना असं व्हील चेअरवर बघून बंगल्याजवळच्या रस्त्यावरून फिरायला जाणाऱ्या लोकांना फार वाईट वाटे.


एक दिवस डॉ.पटेलांना 'ताबडतोब या' असा डॉ. शामलींचा निरोप गेला.नवीनबाबूंना रक्ताची मोठी उलटी झाली होती आणि ते कोमात गेले होते.आठ दिवस ते कोमातच होते.गावातल्या प्रत्येकाने त्यांच्यासाठी देवाकडे प्रार्थना केली.काहींनी मृत्युंजयाचे पाठ सुरू केले.शंकराला अभिषेक तर सतत चालूच होता.पण अखेर नवव्या दिवशी नवीनबाबूंची जीवनयात्रा संपली. गावातल्या एकाही घरात त्या दिवशी चूल पेटली नाही. गावाने एवढी मोठी अंत्ययात्रा पहिल्यांदाच पाहिली.हे सगळं होत असताना डॉ.शामली दगडी चेहऱ्याने शांत होत्या.त्यांच्या डोळ्यांतून एकही टिपूस निघाला नव्हता. त्यांच्या सगळ्या संवेदना जणू गोठून गेल्या होत्या.


आठ दिवस झाले.गाव अजून त्या धक्क्यातून सावरलं नव्हतं तोच त्याला आणखी एक धक्का बसला.डॉ. शामलींनी परत अमेरिकेला जाण्याचा निर्णय घेतला होता.डॉ.पटेलांना आणि त्यांच्या पत्नीला त्यांनी मुंबईपर्यंत येण्याची विनंती केली होती.गावातल्या प्रतिष्ठित मंडळींनी एक सभा घेतली.त्या सभेत ठरल्याप्रमाणे चारपाच पुरुष त्यांच्या कुटुंबीयांसह गावाबाहेरच्या बंगल्यात डॉ.शामलींना भेटायला गेले. त्यांनी डॉ.शामलींनी अमेरिकेला परत जाऊ नये म्हणून गावाच्या वतीने विनंती केली.त्यातल्या एका पोक्त स्त्रीने डॉ.शामलींना आपल्या कुशीत घेतलं.त्यांच्या तोंडावरून हात फिरवत ती म्हणाली,


"बयो,तू गावातच राहा गं.माहेरवाशिणीसारखी आम्ही तुझ्यावर माया करू. तझी काळजी घेऊ..."


आता मात्र शामलींच्या भावनांचा बांध फुटला.उर फुटल्यागत त्या रडू लागल्या.त्यांचं आतापर्यंत बाहेर न फुटलेलं रडू बाहेर येणं आवश्यक होतं,हे सगळ्यांना समजत होतं.त्यामुळे कुणीही त्यांची समजूत न घालता त्यांना मनसोक्त रडू दिलं.रडण्याचा भर ओसरल्यावर स्वतःला सावरत पण शून्यात बघत डॉ.शामली म्हणाल्या, "आता माझा इथला शेअर संपला.इथल्या प्रत्येक गोष्टीत माझी आणि नवीनची स्वप्नं गोठलेली आहेत. मी आता इथे राहणं अशक्य आहे.आमचा प्रांत वेगळा,देश वेगळा.भाषाही वेगळी.तरीही तुम्ही सगळ्यांनी आम्हाला जे प्रेम दिलं त्याची आठवण बरोबर घेऊन मी जात आहे."


शामलींना मुंबईपर्यंत सोडून डॉ.पटेल परत आले. शामलींच्या दोन्ही घरांच्या आणि दवाखान्याच्या चाव्या आता त्यांच्याकडे होत्या.त्याचं त्यांनी काय करायचं ह्याचा निर्णयही शामलींनी त्यांच्यावरच सोपवला होता.डॉ.पटेलांनी गावाबाहेरचा बंगला आवरला. बाजारपेठेतलं घर आवरलं.ते बंद करण्यापूर्वी सगळीकडे एकदा त्यांनी फेरी मारून बघावं म्हणून दवाखान्याच्या मागच्या दरवाजातून ते परसात आले तर काय आश्चर्य !


मध्यभागी पिंपळाचं एक छोटंसं रोप तरारून वर आलं होतं.त्याची दोन छोटी पानं विजयी मल्लाने फड जिंकल्यानंतर हवेत बाहू पसरून आनंद व्यक्त करावा तशी दिमाखाने हवेत डुलत होती.


२२/११/२५

चक्रवर्ती / Chakraborty

मला आठवतंय तेव्हापासून गावात पाण्याची रडच आहे. गावातले लोक गमतीने पाहुण्यांना म्हणत,


" जेवायला आमच्याकडे या पण हात धुवायला शेजारच्या गावात जा." पूर्वीच्या काळी मुलांची लग्नं व्हायलासुद्धा ह्याच कारणाने अडचण व्हायची.मुलीकडचे म्हणायचे, 'नको रे बाबा ह्या गावात लेक द्यायला!पाणी भरून भरूनच मरून जायची पोर.'


बाकी गाव मात्र दुमदार होतं.तालुक्याचं ठिकाण होतं. हवा चांगली होती.मात्र गावात पाणी नसल्याने गावाची वाढ खुंटली होती.असं म्हणतात की,ज्याची लोकसंख्या कमी होत चाललीय असं हे एक अपवादात्मक गाव आहे.गावात नोकऱ्या नसल्याने होतकरू मुलं शिक्षण झालं की,बाहेरगावी नोकरीच्या शोधात गाव सोडून जात होती.गावात फक्त छोटेमोठे व्यावसायिक आणि दुकानदार प्रामुख्याने राहत होते.त्यामुळे गावगप्पांना सगळ्यांकडे भरपूर वेळ होता.गावातल्या पारावर, दुकानांत,नाक्यानाक्यावर गप्पांचे अड्डे जमवलेले लोक दिसत.एखादी बातमी सगळ्या गावात वाऱ्यासारखी पसरे आणि त्याचं चर्वितचर्वण गावभर चाले.


( गावगोत - माधव सावरगांकर -अष्टगंध प्रकाशन )


एकदा अशीच एक बातमी गावभर चर्चेचा विषय झाली. गावातल्या पटेल डॉक्टरांचा मुलगा प्रशांत अमेरिकेत शिकत होता.त्याचा एक बंगाली मित्र आणि त्याची बायको गावात राह्यला येणार आहेत,ही ती बातमी ! बातमीला दुजोरा मिळू लागला.प्रशांतच्या मित्राने आणि त्याच्या बायकोने डॉक्टरीचं शिक्षण अमेरिकेत घेतलं होतं.

तिथेच काही वर्षं प्रॅक्टिसही केली होती.आता त्यांना भारताच्या एखाद्या छोट्या गावात येऊन इथे प्रॅक्टिस करायची होती म्हणे.

प्रशांतकडून त्यांनी त्याच्या गावाची माहिती ऐकली आणि कुठे तरी जायचं तर ह्या गावातच जाऊ या,निदान इथे प्रशांतचे कुटुंबीय तरी आहेत.त्याचे वडीलपण ह्याच व्यवसायात आहेत. अडीअडचणीला त्यांची मदत होऊ शकेल.काही वर्षं एक नवीन अनुभव घेऊ या.

नाही जमलं तर परत अमेरिकेत येऊ.ह्या विचाराने त्यांनी इथे येण्याचा निर्णय पक्का केला.सगळ्या गावात आता दुसरा विषयच नव्हता.अमेरिकेतला डॉक्टर गावात येणार म्हणजे उठसूट उपचारासाठी जिल्ह्याच्या गावी पळायला नको. 


गावात एकही डॉक्टरीण नव्हती.बाळंतपण सुईणी करायच्या.ही नवीन डॉक्टरीण आली म्हणजे बायकांचीसुद्धा आता मोठी सोय होणार होती.मग कुणीतरी म्हणालं,"नवीन डॉक्टरचं नाव चक्रवर्ती आहे म्हणे.म्हणजे राजघराण्याशी संबंध दिसतोय !"गावात बहुतांशी मराठी वस्ती होती.व्यापारीवर्गातले मारवाडी, गुजराती कुटुंबंही मराठीच बोलत.गावातली मुसलमान मंडळीदेखील 'म्हमद्या भागके भागके जाऊन वट्यावर चढ' अशाच पद्धतीचं,हिंदीला नुस्तं स्पर्श करणारं मराठी बोलत.त्यामुळे चक्रवर्ती आडनाव ह्यापूर्वी कधी कुणी ऐकलं नव्हतं.त्यामुळे डॉक्टरकुटुंब राजघराण्याशी संबंधित असावं असं सगळेजण ठामपणे सांगू लागले.गावाला ऐतिहासिक पार्श्वभूमी होती. 


पेशव्यांचे सरदार विंचुरकर ह्यांनी गाव वसवलं होतं म्हणून गावात वाडे,गढ्या ह्यांची कमतरता नव्हती. बरेचसे वाडे आता मोडकळीस आले होते.पण प्रत्येकाच्या कहाण्या आणि आख्यायिका होत्या.

अशा वाड्यांमध्ये बळदं,भुयारंसुद्धा भरपूर होती.त्यामुळे आख्यायिकांना पोषक असं वातावरण होतं.


अमेरिकन पाहुणे मात्र डॉक्टर पटेलांच्याच शेजारी असलेल्या एका टुमदार घरात सुरुवातीचे काही दिवस राहणार होते आणि प्रशांतचे वडील ज्या धर्मादाय दवाखान्यात प्रॅक्टिस करायचे तिथूनच सुरुवात करणार होते.डॉ.शांतिलाल पटेल ह्यांनी त्या उभयतांसाठी दवाखान्यात दोन नवीन केबिन्सदेखील बांधून घेतल्या. गावातला प्रत्येक जण त्या बघूनही आला.आता फक्त चक्रवर्ती दाम्पत्य येण्याचीच वाट होती.


त्यांच्या येण्याचा दिवस ठरला आणि डॉ.शांतिलाल पटेल मुंबईला पाव्हण्यांना आणायला गेले.गावकऱ्यांची उत्सुकता शिगेला पोहचली होती.धर्मादाय दवाखान्याच्या केबिन्सवर डॉ. एन. सी. चक्रवर्ती आणि डॉ.शामली चक्रवर्ती ह्या नावांच्या पाट्या लागल्या आणि लोकांच्या कल्पनाशक्तीला ऊत आला. डॉक्टरांचं नाव न वरून म्हणजे नीतीन,नवीन वगैरे असणार.वडिलांचं नाव चिंतामणी,चंद्रकांत वगैरे असावं, असाही तर्क केला गेला.पण नंतर पटेल कुटुंबीयांकडून समजलं की,बंगाली पद्धतीप्रमाणे वडिलांचं नाव देण्याऐवजी दोन्ही आद्याक्षरं डॉक्टरांच्या स्वतःच्याच नावाची होती.डॉक्टरांचं नाव होतं सवीनचंद्र,लोकांना सगळंच नवीन होतं.आता फक्त त्या दोघांना पाहण्याचीच वाट होती.येणार येणार म्हणून गाजत असलेल्या डॉक्टर दाम्पत्याला घेऊन डॉ.शांतिलाल पटेलांची गाडी आली.घराघरांच्या खिडक्यांतून, सज्जांतून अनेक उत्सुक डोळे त्यांना पाहत होते.गाडी थांबली.डॉक्टरदाम्पत्य गाडीतून खाली उतरलं. नवीनचंद्र हे चांगले उंचेपुरे,नाकीडोळी नीटस असलेले होते.दंडाशी घट्ट असलेल्या टी शर्टच्या बाह्यांतून त्यांचे कमावलेले दंड नजरेत भरत होते.त्यांनी केस उलटे वळवलेले होते.त्यातून एक चुकार बट सारखी कपाळावर येत होती आणि ती मागे करण्याची त्यांची लकब आकर्षक होती.दिसण्यामध्ये शामली निर्विवाद भाव खाऊन जाईल अशी होती.नावाप्रमाणे सावळी असली तरी तिचे डोळे लक्षात येण्याइतके तेजस्वी होते. तिच्या धारदार नाकाला चाफेकळीचीच उपमा योग्य ठरली असती.डॉ.पटेलांशी बोलताना ती एकदा हसली आणि तिचे पांढरे स्वच्छ दात बघितल्यावर ती एकूणच सुंदर आहे असं सगळ्यांचं मत झालं.पांढरीशुभ्र रेशमी साडी तिच्या सावळ्या रंगाला शोभून दिसत होती. कपाळावरचं अन् भांगातलं लालभडक कुंकू तिच्या सौंदर्यात भरच टाकत होतं.


चक्रवर्ती दाम्पत्याने आजूबाजूला पाहिलं आणि लोक आपल्याला बघण्यासाठीच आले आहेत,हे त्यांच्या लक्षात येताच त्या दोघांनीही हात जोडून हसतमुखाने चारी बाजूंना बघत वंदन केलं.त्यासरशी त्यांनी पहिल्या दर्शनातच तिथे असलेल्या लोकांना पर्यायाने सगळ्या गावाला जिंकलं.ते दोघे घरात शिरले आणि त्यांना बघायला उभी असलेली मंडळी आपापल्या अड्ड्यांवर त्यांच्याविषयीची माहिती द्यायला रवाना झाली.प्रत्यक्ष न बघताही थोड्याच अवधीत सगळ्या गावाचं चक्रवर्ती दाम्पत्याबद्दल अतिशय चांगलं मत झालं.


संध्याकाळी त्यांच्या सामानाचा ट्रक आला.दोन दिवस चक्रवर्ती जोडी पटेल कुटुंबातील नोकरांच्या मदतीने सामान लावत होती.

किरकोळ मदतीसाठी सुतार आणि इलेक्ट्रिशियन बोलावले होते.शामलीच्या बरोबरीने नवीनबाबूंना घरकामात मदत करताना बघून त्यांना आश्चर्यच वाटलं.गावात घरकामात बायकांना इतकी मदत करणारा पुरुष त्यांनी पाहिलाच नव्हता.


दोन दिवसांनंतर नवीनबाबू आणि शामलीमॅडमनी दवाखान्यात यायला सुरुवात केली.एकदोन दिवसांतच ह्या धर्मादाय दवाखान्याचं जणू नशीबच पालटलं. वाढती गर्दी पाहून डॉ.पटेल चकितच झाले.इंग्रजी टोन असलेले दोघेही डॉ.चक्रवर्ती बंगाली मिश्रित हिंदी बोलण्याचा प्रयत्न करत होते.लोकांना तर त्याचंही कौतुकच वाटत होतं.तेही मोडक्यातोडक्या हिंदीत त्यांच्याशी संवाद साधत होते.डॉक्टर माधवला 'माधब' कसं म्हणतात आणि उस्मानपुऱ्यातल्या गनीला 'गोनी' कसं म्हणतात अशा बारीकसारीक गोष्टींची चर्चा गावात कौतुकाने होऊ लागली.दोन्ही डॉक्टरांची स्मरणशक्ती तल्लख होती.एकदा भेटलेल्या व्यक्तीचं नाव त्यांना बिनचूक आठवत असे.थोड्या चुकीच्या पद्धतीने का होईना पण आपलं नाव लक्षात ठेवून डॉक्टरांनी उच्चारलं ह्याचं अप्रूप लोकांना वाटू लागलं.


दिवसागणिक दवाखान्यातली गर्दी वाढू लागली. दोघांच्याही हाताला चांगला गुण आहे असं सार्वत्रिकरीत्या मत तयार झालं.

सकाळी साडेनवाला दवाखाना उघडायचा.लोक त्याच्या आधीपासून रांग लावून बसलेले असत.दुपारी एकपर्यंत पेशंटना तपासणं अव्याहत चाले.बरोबर एक वाजता दवाखाना बंद व्हायचा तो साडेपाचला परत चालू होई.डॉक्टर दाम्पत्याच्या हातगुणाची आणि नियमितपणाची ख्याती पंचक्रोशीत पसरली.त्यामुळे कुठून कुठून रोगी त्यांच्याकडे उपचारासाठी येऊ लागले.रात्री नऊपर्यंत दवाखाना चालू असायचा.रविवारी मात्र पूर्ण दिवस बंद. एका महिन्यानंतर नवीनचंद्रांनी डॉक्टर पटेल ह्यांच्याकडे स्वतःचा दवाखाना सुरू करण्याविषयी आणि राहण्याच्या जागेसंबंधी चर्चा केली.डॉ..पटेलांनी त्यांना म्हटलं,"वेगळा दवाखाना सुरू करण्याची गरज आहे काय ? इथेही व्यवस्थित चाललं आहे ना."पण नवीनचंद्रांचे विचार स्पष्ट होते.त्यांनी म्हटलं, "डॉक्टरी क्षेत्रात खूप नवीन मशिन्स आली आहेत. त्यामुळे रोगाचं निदान करायला मदत होते.अर्थात त्यासाठी मोठ्या गुंतवणुकीची गरज असते.इथे धर्मादाय दवाखान्यात इतक्या मोठ्या गुंतवणुकीला विश्वस्त मंजुरी देणार नाहीत.त्यामुळे आम्ही स्वतःचा दवाखाना सुरू केला तर अशी मशिन्स आम्हाला घेता येतील आणि पेशंट्सची सेवा उत्तमप्रकारे करता येईल."


डॉ.पटेलांना नवीनबाबूंचं म्हणणं रास्त वाटलं.मग दर रविवारी डॉक्टरांच्या दवाखान्यासाठी जागेचा शोध सुरू झाला.खाली तळमजल्यावर प्रशस्त दवाखाना आणि वरच्या मजल्यावर राहण्यासाठी मोठं घर अशी ढोबळ कल्पना नवीनबाबूंच्या मनात होती.अशी जागा काही मिळेना तेव्हा एखाद्या मोकळ्या जागेवर नवीन बांधकाम करावं असा विचार करून त्या दृष्टीने जागेचा शोध सुरू झाला.शामलीमॅडमना वाटत होतं,जागा अशी असावी की,ती सर्व वयाच्या पेशंट्सना यायला सोयीस्कर असली पाहिजे,त्यामुळे ती गावापासून दूर असू नये.पण गावात अशी मोकळी जागा डॉक्टरांच्या नजरेसमोर येत नव्हती.


एका रविवारी चक्रवर्ती दाम्पत्य घराबाहेर पडलं.मुख्य रस्त्यावरून चालत असताना एका ओसाड घराकडे त्यांचं लक्ष गेलं.ते घर बहुधा बरीच वर्षं बंद असावं. दारावरच्या कड्या-कोयंडेच काय,

कुलूपदेखील गंजून गेलं होतं.भिंतीही ढासळायला लागल्या होत्या.दोघांनी थांबून त्या घराविषयी विचारपूस करायचं ठरवलं. समोरच स्टोव्ह,गॅसबत्त्या दुरुस्तीचं दुकान होतं. दुकानावर ठळक अक्षरात दुकानाच्या नावाची पाटी होती - येथे वेळेवर काम होणार नाही.


अमेरिकेत असताना प्रशांतने आपल्या गावातल्या गमतीजमती सांगताना ह्या दुकानाबद्दल आणि त्याच्या विक्षिप्त नावाबद्दल सांगितलं होतं.ते आता आठवून दोघंही हसले.दुकानात एक तरतरीत तरुण बसला होता. त्याच्याकडे चौकशी केल्यावर ते घर विकायला त्याचा मालक उत्सुक आहे पण गिऱ्हाईक मिळत नाही म्हणून गेली कित्येक वर्षं ते घर तसंच पडून असल्याचं कळलं. ती जागा आतून पाहण्याची दोघांनाही इच्छा झाली.तो तरुणही त्यांना मदत करायला उत्सुक होताच.त्याने तत्परतेने म्हटलं,


"तुम्ही म्हणत असाल तर आत्ता जागा दाखवतो.ते कुलूप काय,नुस्तं शोभेचं आहे.खाली खेचलं तरी उघडेल!"


बोलता बोलता तो दुकानाबाहेर आला.त्या पडक्या घराच्या दाराचं कुलूप त्याने झटक्यात खाली खेचलं आणि खरंच,तो म्हणाला त्याप्रमाणे ते उघडलंही.त्या तरुणापाठोपाठ दोघेही आत शिरले.

एखाद्या भयपटात दाखवतात तसं दृश्य त्यांना समोर दिसलं.


दरवाजा उघडल्याबरोबर दोनचार पारवे फडफड करत बाहेर उडत गेले.वटवाघळांची जोडी दिसली त्यावरून त्यांचाही मुक्काम इथेच आहे,हे लक्षात आलं.घरभर धुळीचे थरच थर होते.जागोजागी कोळिष्टकांच्या जाळ्यांनी घराचा प्रत्येक कोपरा व्यापला होता.घर बंद अवस्थेत असल्यामुळे एक प्रकारचा कुबट वास जीव गुदमरून टाकत होता.खिळखिळ्या झालेल्या खिडक्या त्या तरुणाने उघडल्या.ट्रॅक पँट नि टी शर्ट घातलेल्या नवीनबाबूंना अशा घाणेरड्या जागेत वावरताना विशेष त्रास होत नव्हता.आपल्या ट्रेड मार्क पांढऱ्या स्वच्छ रेशमी साडीसकट शामलीमॅडमही सहजपणे तिथे वावरत होत्या.घर चांगलंच प्रशस्त होतं.मागचं दार उघडून परसदारात आलं तर तिथे एक प्रचंड प्राचीन पिंपळवृक्ष दिसला.

त्याला कधीकाळी बांधलेला पार अजूनही व्यवस्थित होता.पारावर झाडाला टेकून शेंदूर लावलेला एक दगड ठेवलेला होता.त्या दगडावर वाहिलेल्या हळद-कुंकवाचं अस्तित्व इतक्या वर्षांनंतरही जाणवत होतं.परसू तसं प्रशस्त होतं.पिंपळाच्या पारामागेही दहाएक फूट जागा मोकळी होती.नवीनबाबू आणि शामली दोघंही जागा बघून खूश झाले."हे घर पाडून मोकळ्या जागेत आपण ठरवल्याप्रमाणे अद्ययावत् दवाखाना आणि प्रशस्त घर बांधून होईल." नवीनबाबूंनी शामलीला म्हटलं.


"हो,पण ह्या झाडाचं काय?" शामलीने शंका काढली.


"झाडाचं काय म्हणजे ? ते तोडावंच लागेल." नवीनबाबूंनी उत्तर दिलं.नवीनबाबूंचं उत्तर ऐकून सोबत आलेला तो तरुण दचकून म्हणाला, "डॉक्टरसाहेब,पिंपळाचं झाड कुणी तोडत नाहीत.पाप लागतं !" "हे पाहा,ह्या असल्या गोष्टींवर माझा अजिबात विश्वास नाही आणि तुम्ही म्हणता - तसं पाप आम्हाला अजिबात लागणार नाही.कारण ह्या ठिकाणी लोकांना बरं करण्याचं नेक काम आम्ही करणार आहोत.बरं,ते जाऊ दे.ह्या घराचे मालक कोण आहेत नि ते कुठे राहतात ?" "ह्या घराचे मालक असलेले नवरा-बायको दोघंही हयात नाहीत.त्यांना मूलबाळ झालं नाही.त्यांचे दूरचे नातेवाईक आहेत पण ते जिल्ह्याच्या ठिकाणी राहतात. कडे कुणी फिरकत नाही." चक्रवर्तीदाम्पत्य घरी आलं.डॉ.पटेलांच्या कानावर त्या घरासंबंधीची माहिती घातली तेव्हा त्यांनीही थोडंफार त्या तरुणासारखंच मत व्यक्त केलं आणि आपण दुसरी एखादी बऱ्यापैकी जागा शोधू असं सुचवलं.पण शामली आणि त्यातल्या त्यात नवीनबाबूंना भरबाजारातली ती प्रशस्त जागा इतकी आवडली की,त्यांनी सगळे मुद्दे खोडून काढले.जागेचा सौदा लगेचच झाला.जागा विकणारा आणि घेणारा दोघांनीही घाईने हा व्यवहार खुशीने पूर्ण केला.ही अपशकुनी जागा डॉक्टरांचा विचार पालटण्याआधी विकणाऱ्याला विकायची होती आणि इतकी सोयीची आणि प्रशस्त जागा कुणा दुसऱ्याने विकत घेण्याआधी आपल्या नावावर व्हावी म्हणून नवीनबाबूंना घाई झाली होती.


आपल्या आवडत्या जोडप्याने ही जागा विकत घ्यायचा निर्णय घ्यावा आणि घर-दवाखाना बांधण्यासाठी पिंपळाचा वृक्ष तोडायचं ठरवावं,हे डॉ.पटेल ह्यांनाच काय,पण गावातल्या अनेकांना रुचलं नाही.कुणी आडूनआडून तर कुणी सरळ डॉक्टर नवीनबाबूंना-

शामलीबाईंना प्रत्यक्ष भेटून सांगण्याचा प्रयत्न केला. पण दोघांनीही त्याकडे दुर्लक्ष केलं.प्रत्येकाच्या मनात पाल चुकचुकत राहिली.डॉ.पटेल ह्यांनी तर ज्योतिषाकडे जाऊन त्याचं मतही विचारलं.त्याने 'जागा शांत वगैरे करून घराचा दोष काढता येईल पण कुठल्याही परिस्थितीत पिंपळ तोडू नये'असं बजावलं. डॉ.पटेलांनी हे नवीनबाबूंच्या कानावर घातलं पण त्यांनी वाद घालायचं टाळून पटेलांच्या बोलण्याकडे चक्क दुर्लक्ष केलं.


मुंबईच्या प्रसिद्ध आर्किटेक्टने घराचा नकाशा तयार केला.

जिल्ह्याच्या ठिकाणच्या एका कॉन्ट्रॅक्टरवर घर बांधण्याचं काम सोपवलं.समोरच्या दुकानाचं नाव जरी 'इथे वेळेवर काम होणार नाही'असं असलं तरी चक्रवर्तीच्या घराचं काम वेळेवर सुरू झालं.


तो वाडा पाडल्यावर मोकळी झालेली ती जागा पाहून साऱ्या गावकऱ्यांचे डोळे विस्फारले.इथे एवढी मोठी जागा असेल अशी कुणी कल्पनाच केली नव्हती.वाडा पाडल्याने पिंपळ,पार आणि पारावरचा तो शेंदूर फासलेला देव रस्त्यावरून ये जा करणाऱ्यांना दिसू लागले.प्रत्येक जण पिंपळ तोडल्याबद्दल मात्र नाराज होता.भीती व्यक्त करत होता.सगळ्यांनाच त्या देखण्या डॉक्टर दाम्पत्याविषयी आता काळजी वाटू लागली होती.ते दाम्पत्य मात्र स्वप्नपूर्ती होणार ह्या आनंदात होतं.दररोज सकाळी दवाखाना उघडण्याआधी थोडा वेळ आणि रविवारचा बराचसा वेळ नवीनबाबू नवीन जागेच्या साईटवर घालवत.बघता बघता घर पाडून झालं. मोकळी जागा मिळाली. तिच्यावर स्वच्छता झाली.आता वेळ होती कुऱ्हाड चालवायची.त्यासाठी मागेल तेवढी मजुरी देण्याची तयारी असूनसुद्धा मजूर काही मिळेनात.पण नवीनबाबू अशा गोष्टींनी मागे फिरणारे गृहस्थ नव्हते.त्यांनी कॉन्ट्रॅक्टरला बाहेरच्या गावांतून,गरज पडली तर बाहेरच्या प्रांतांतून मजूर आणायला फर्मावलं.कॉन्ट्रॅक्टरही जिद्दीला पेटला.त्याने प्रयत्नपूर्वक मजुरांची टोळी आणली.झाड तोडण्यासाठी म्युनिसिपालिटीची परवानगी काढली आणि मजुरांची टोळी कामाला लागली.कॉन्ट्रॅक्टर खरं तर मनातून घाबरला होता पण तसं निदान दाखवत तरी नव्हता. त्याने पारावरच्या देवाची पूजा केली.गावाबाहेरच्या तळ्याच्या बाजूला एक पाच फूट…अपुरे राहिलेला भाग पुढील लेखामध्ये..

२०/११/२५

गांधीवादाची शोकांतिका / The Tragedy of Gandhism

वि. म. दांडेकर..!


महात्मा गांधींच्या लोकोत्तर व्यक्तिमत्त्वाचे मूल्यमापन करताना अनेकांनी त्यांना अनेक नावांनी संबोधले आहे. पंडित जवाहरलाल नेहरूंनी त्यांना राष्ट्रपिता म्हटले. मला वाटते सर्व संबोधनांत हे संबोधन अधिक सार्थ आहे.महात्मा गांधींनी खऱ्याखुऱ्या अर्थाने भारताची राष्ट्रीय घडण केली.भारताच्या स्वातंत्र्यप्राप्तीकरता त्यांनी देशव्यापी चळवळ उभारली आणि शेवटपर्यंत तिचे नेतृत्व केले.त्याकरता आवश्यक ते राजकारणी व्यवहार कौशल्य त्यांच्यापाशी होते.परंतु तेवढ्याने राष्ट्रपिता या संबोधनास ते पात्र झाले नसते.कारण राजकीय स्वातंत्र्यप्राप्ती हा राष्ट्रीय घडणीचा केवळ एक भाग आहे.निव्वळ व्यवहारकुशल राजकारणाने कदाचित स्वातंत्र्यप्राप्ती झाली असती परंतु राष्ट्रनिर्मिती झाली नसती.राष्ट्राची घडण करावयाची तर राजकारणाला राजकीय तत्त्वज्ञानाची जोड द्यावी लागते हे त्यांनी आरंभीच ओळखले आणि प्रथमपासून आपल्या राजकारणाला तात्त्विक व नैतिक अधिष्ठान दिले. असे तत्त्वज्ञान सामान्यजनांपर्यंत पोहचवावयाचे तर त्याला थोडाबहुत आचारधर्म चिकटवावा लागतो. महात्मा गांधी हे एक अत्यंत कुशल समाजधुरीण असल्याने त्यांनी आपल्या तत्त्वज्ञानाला जनमनाची पकड घेईल असा आचारधर्म चिकटवला आणि शिस्तबद्ध राजकीय संघटना उभी करण्यास आवश्यक म्हणून या आचारधर्माचा आग्रह धरला.दुर्दैवाने महात्मा गांधींच्या काही अनुयायांना एवढा आचारधर्मच काय तो समजला.असा आचारधर्म स्थलकालपरिस्थितिसापेक्ष असतो आणि असावयास हवा हेही ते विसरले. दैनंदिन सामाजिक व राजकीय व्यवहार सांभाळण्याची जबाबदारी जशी महात्मा गांधींवर होती तशी या अनुयायांवर नव्हती.त्यामुळे खुद्द महात्मा गांधींनाही परवडणार नाही असा आचारधर्माचा आग्रह त्यांनी धरला.


'गांधींपेक्षाही कट्टर गांधीवादी' म्हणून त्यांना कोणी म्हटले तर 'आपले काही चुकत तर नाही ना?' असा विचार करण्याऐवजी त्यांना स्वतःचे कौतुकच वाटू लागले.या मंडळींनी गांधीवादाच्या नावाखाली एक नवीन कर्मकांडाचे स्तोम माजविले. कर्मकांडाच्या खोड्यात स्वतःला आणि गांधीवादाला अडकवून घेऊन सारा व्यवहारच अशक्यप्राय केला. स्वतःचे हसे करून घेतले आणि गांधीवाद अव्यवहार्य ठरविला.या एकांतिक गांधीवाद्यांच्या दुसऱ्या टोकाला स्वतःला 'बुद्धिवादी' म्हणवून घेणारी काही मंडळी होती.राजकारणाला तात्त्विक व नैतिक अधिष्ठान हवे ही गोष्टच मुळात या मंडळीच्या बुद्धीला गम्य झाली नाही. याचे कारण राजकीय स्वातंत्र्यप्राप्तीव्यतिरिक्त राष्ट्र उभारणीचे काही कार्य आहे हेच त्यांना उमगले नाही.स्वातंत्र्यप्राप्तीपुरते बोलावयाचे तर तेही त्यांच्यासारखे दहावीस बुद्धिमान आपल्या राजकीय कौशल्याने इंग्रजांपासून मिळवू शकतील अशी त्यांची मनोमन खात्री होती.ही मंडळी सर्व दृष्टींनी बुद्धिमान असली तरी जनमानसासंबंधीचे त्यांचे अज्ञान आश्चर्यकारक होते. राजकीय स्वातंत्र्यप्राप्ती आणि नवराष्ट्र उभारणीच्या या साऱ्या खटाटोपात जनताजनार्दन आणि जनमानस यांचा संबंध काय ह्याचेच आकलन त्यांना कधी झाले नाही.साहजिकच महात्मा गांधींच्या सर्वस्पर्शी,धुरंदर राजकीय नेतृत्वापुढे ही मंडळी हतप्रभ झाली.महात्मा गांधीच्या पश्चात् राष्ट्राच्या नेतृत्वाची धुरा पंडित जवाहरलाल नेहरूंच्याकडे आली.पंडित नेहरू बुद्धिवादी असले तरी त्यांना जनमानसाची पूर्ण ओळख होती.राजकारणाला तात्त्विक व नैतिक अधिष्ठान हवे हा गांधीवादाचा आशय त्यांनी जाणला होता.त्यामुळे त्यांनीही आपल्या राजकारणास विरोध वा विसंगत नाही परंतु तरीही स्वतंत्र अशा राजकीय तत्त्वज्ञानाची जोड दिली आणि राष्ट्रउभारणीचे कार्य चालू राहिले.पंडित नेहरूंच्या पश्चात् आज पुनश्च याविषयी बुद्धिभ्रंश झालेला दिसतो.भारताच्या राष्ट्रउभारणीचे कार्य अजून अपुरे आहे,ते आणखी काही पिढ्या चालू ठेवल्याशिवाय भारताचे राष्ट्रीय जीवन निर्वेध होणार नाही,सामाजिक व राजकीय नेत्यांची ही प्राथमिक जबाबदारी आहे इत्यादी गोष्टींचा आज विसर पडला आहे. साहजिकच राजकारणाला तात्त्विक व नैतिक अधिष्ठान राहिलेले नाही आणि त्याची गरजही वाटेनाशी झाली आहे.


किंबहुना सर्व तात्विक व नैतिक विचारांची 'पुस्तकी' म्हणून अवहेलना करावी आणि तत्त्वशून्य राजकारणाचा 'व्यवहारवाद' म्हणून उदोउदो करावा अशी प्रथा पडत आहे.एकांतिक गांधीवाद्यांनी एके काळी माजविलेल्या कर्मकांडाच्या स्तोमाची ही प्रतिक्रिया आहे.म्हणून राजकारण,समाजकारण किंबहुना सर्व मानवी व्यवहार त्यांना काहीतरी तात्त्विक वा नैतिक अधिष्ठान हवे हा जो गांधीवादाचा आशय आहे,त्याचा अर्थ समजावून घेतला पाहिजे. तात्त्विक अधिष्ठान म्हणजे तत्त्वज्ञानाची लोखंडी चौकट नव्हे.राजकारण,समाजकारण हे बोलून चालून मानवी व्यवहार आहेत.त्यांत वावरावयाचे तर व्यावहारिक तारतम्याचे स्वातंत्र्य हवे.परंतु म्हणून योग्य काय अयोग्य काय,न्याय्य काय अन्याय्य काय,नैतिक काय अनैतिक काय यासंबंधीचा निर्णय करणे सुटत नाही हे लक्षात ठेवले पाहिजे.हे निर्णय सुसंगतपणे करावयाचे तर कोण्यातरी तात्त्विक,नैतिक निकषाची गरज भासते. उपमाच द्यावयाची तर संगीतातील षड्जाची देता येईल. संगीतात षड्जाला जे महत्त्व आहे तेच राजकारणात समाजकारणात तात्त्विक वा नैतिक अधिष्ठानाला आहे. कलाकार त्याच्या आंतरिक स्वरात मिळेल तो षड्ज स्वीकारतो.त्यावर आपली बैठक स्थिर करतो. एवढे केले म्हणजे कोणताही राग कोणत्याही ढंगाने गाण्यास तो मोकळा असतो. मात्र स्वीकारलेला षड्ज त्याला सोडता येत नाही.षड्ज सुटला तर कलाकार काय गातो ते त्याचे त्यालाही कळणार नाही,तो भरकटत जाईल. सूर आणि बेसूर यांचा निर्णय करता येणार नाही.किंंबहूना संगीत संगीतच रहाणार नाही.तीच गोष्ट राजकारणाची आहे.राजकारणाला तात्त्विक,नैतिक अधिष्ठान नसेल तर योग्य काय अयोग्य काय,न्याय्य काय अन्याय्य काय,

नैतिक काय,अनैतिक काय,यांचा निर्णय करता येणार नाही.

राजकारणाच्या दृष्टीने हे सर्व प्रश्न अप्रस्तुत आहेत असे काही व्यवहारवादी मानतात, सत्तास्पर्धा एवढेच राजकारणाचे स्वरूप त्यांना समजते, त्यांना एवढेच सांगावयाचे की केवळ सत्तास्पर्धेत टिकून रहाण्याकरतासुद्धा राजकारणाला तात्त्विक,नैतिक अधिष्ठान असावे लागते.तत्त्वशून्य,दिशाहीन,सत्तास्पर्धेत भरकटत जाणारे राजकारण सामान्य जनता फार काळ मान्य करीत नाही.निव्वळ छक्क्यापंजांचे राजकारण खेळून सत्तेवर अबाधित रहाता येते अशी कोणा सत्ताधीशांची समजूत झाली असेल तर तो निव्वळ भ्रम आहे. त्याचा निरास होण्यास फार काळ लागणार नाही.


विशाल मानवतावाद आणि त्यांच्याशी सुसंगत अशी स्वनिष्ठा हे गांधीवादाचे षड्जपंचम आहेत.विशाल मानवतावादाने महात्मा गांधींनी आपल्या राजकारणास आवश्यक ते नैतिक अधिष्ठान दिले.स्वाभिमान व स्वनिष्ठेची तार छेडून त्यांनी राष्ट्रजागृतीचा मंत्र दिला. महात्मा गांधी उभे राहिले आणि भारत उभा राहिला. त्याकरिता राजकीय स्वातंत्र्य आणि आर्थिक विकास यांचीही वाट पहावी लागली नाही.राजकीय पारतंत्र्यात आणि आर्थिक दारिद्र्यातही देशाला मानवतावादाच्या नैतिक अधिष्ठानावर स्वाभिमानाने आणि स्वनिष्ठेने मान ताठ करून उभे राहणे शक्य आहे हे त्यांनी स्वतःच्या उदाहरणाने सिद्ध करून दाखविले.


गरीब माणसाने स्वाभिमानाने जगावयाचे तर दारिद्र्याबरोबर येणारे सर्व न्यूनगंड सोडून दिले पाहिजेत आणि आपले अंथरुण पाहून पाय पसरण्यास शिकले पाहिजे.श्रीमंत माणसाचा सहवास घडला म्हणजे गरीब माणसाला आपल्या अन्नवस्त्राबद्दल साहजिकच कमीपणा वाटतो आणि तो श्रीमंत अन्नवस्त्राचे नसते नाटक करू पाहतो.असल्या न्यूनगंडाने श्रीमंती येत नाही.मात्र स्वाभिमान नष्ट होतो आणि अंती अपमान पदरी येतो. महात्मा गांधींनी देशाला क्षणार्धात या न्यूनगंडापासून मुक्त केले आणि त्याचे प्रतीक म्हणून आपले अन्नवस्त्र, पुरे अपुरे असेल तसे,स्वाभिमानाने वापरण्यास शिकवले.गांधीवाद्यांनी त्याचा मथितार्थ बाजूस ठेवला आणि या साध्या व्यवहारी स्वाभिमानी शिकवणीचा अर्थ केला की माणसाने आपल्या भौतिक गरजाच शक्यतितक्या कमी केल्या पाहिजेत हीच गांधीवादाची शिकवण आहे.त्यातून काही प्रामाणिक कर्मकांड आणि पुष्कळशी भोंदूगिरी निर्माण झाली.


स्वाभिमानाबरोबरच महात्मा गांधींनी देशाला स्वनिष्ठेची शिकवण दिली.स्वनिष्ठा म्हणजे आम्ही आमच्यापाशी आहेत या साधनांनिशी स्वतःच्या पायावर उभे राहू आणि एक एक पाऊल पुढे टाकू,हा विश्वास. स्वावलंबनाने,स्वनिष्ठेने मनुष्य अंतर्मुख होतो.आपण आपल्यापाशी असलेल्या सर्व साहित्याचा,साधनांचा पूर्ण उपयोग करून घेत आहोत का हा प्रश्न सतत विचारीत राहतो.या उलट परावलंबनाचे आहे.परावलंबी मनुष्य बहिर्मुख असतो.कोणाच्या तरी साहाय्याखेरीज आपण आपल्या पायावर उभे राहूच शकत नाही अशीच मनाची धारणा असली म्हणजे मनुष्य स्वतःचे सामर्थ्य,साहित्य व साधने यांचा विचारच करीत नाही.आधुनिकता, अद्ययावतता यांनी दिपून गेल्यामुळे त्याला 'आपल्यापाशी असलेले साहित्य व साधने' निरुपयोगी वाटतात आणि तो अधिकाधिक परावलंबी बनतो.आपणापाशी असलेल्या साहित्यसाधनांचा पूर्ण उपयोग म्हणजे स्वनिष्ठा.तिचे प्रतीक म्हणून महात्मा गांधींनी सूतकताईचा कार्यक्रम सांगितला.परंतु गांधीवाद्यांनी त्याचाही मथितार्थ बाजूस ठेवून त्याचे कर्मकांड केले आणि त्यात सोवळे-ओवळे आणले. आहेत त्या साधनांवर निष्ठा म्हणजे नवीन साधने निषिद्ध असे ठरवले आणि आर्थिक प्राप्ती तत्त्वतःच अशक्य केली.


स्वाभिमान व स्वनिष्ठा या गांधीवादाच्या मूळतत्त्वांचा अशा रीतीने गांधीवाद्यांनी विपर्यास केल्यामुळे स्वतःस बुद्धिवादी म्हणवून घेणाऱ्या गांधीवादाच्या टीकाकारांना साहजिकच फावले.

गांधीवादाने गरीब माणसास स्वाभिमानाने जगण्यास शिकवले.

बुद्धिवाद्यांनी त्याचा अर्थ केला की गांधीवादास दारिद्रय मंजूर आहे. गांधीवाद हा तत्त्वतःच संपन्न जीवनाच्या विरोधी आहे. गांधीवादाने गरीब माणसास असेल त्या साहित्यानिशी कामास प्रवृत्त केले.बुद्धिवाद्यांनी त्याचा अर्थ केला की गांधीवादाचा नवीन साधनास आणि पर्यायाने विज्ञानासच विरोध आहे.तात्पर्य, गांधीवाद हा भौतिक व आर्थिक प्रगतीस विरोधी व मारक आहे असे बुद्धिवाद्यांनी ठरविले.


सध्या व्यवहारवादाचा अंमल जारी आहे. व्यवहारवादाला तात्त्विक व नैतिक अधिष्ठानाचे तर वावडे आहेच;परंतु साधा स्वाभिमानही आर्थिक विकासाच्या आड येतो.स्वाभिमान,वस्तुनिष्ठा या ऐवजी मतलब व स्वार्थ ह्याच आर्थिक विकासाच्या प्रेरणा आहेत असे व्यवहारवाद्यांनी ठरविलेले दिसते. 


त्यामुळे व्यवहारवादाचाच एक भाग म्हणून गांधीवादाचे केवळ ढोंग राहिले आहे.बाकी गांधीवादातील स्वाभिमान व स्वनिष्ठेचा विसर पडलेला आहे.आज देश स्वतंत्र असला तरी स्वातंत्रत्र्यरक्षणास अपरिहार्य अशा समजुतीने,देश आर्थिक दृष्ट्या पूर्वर्वीपेक्षा सुस्थितीत असतानाही अधिक आर्थिक विकासास अवश्य आहे अशा समजुतीने,व्यवहारवादी राजकीय व सामाजिक नेते आणि राज्यकर्ते जगभर लाचारपणे,दीनवाणे भीक मागत हिंडत आहेत.जेमतेम पंचवीस तीस वर्षापूर्वीच परतंत्र,पराधीन आणि पराभूत बनलेले स्वतंत्र भारताचे नेते,ही दोन चित्रे शेजारी शेजारी ठेवून बघण्याजोगी आहेत.राज्यकर्त्यांनी अंगीकारलेले हे परावलंबी धोरण देशात खोलवर रुजले आहे.कोठे काही फुकट मिळते का हे शोधत राज्यकर्ते जगभर भीक मागत हिंडत आहेत आणि सरकारकडून काही फुकट पदरात पाडून घेता येते का याचा शोध घेत देशातील नागरिक धावाधाव करीत आहेत.याला म्हणतात कल्याणकारी शासन! आपण बाहेर भीक मागावी आणि देशात लोकांना भीक मागण्यास शिकवावे असा हा सत्तेवर राहण्याचा सोपा मार्ग सापडला आहे.


मग स्वाभिमान व स्वनिष्ठेची आठवण कोणास होणार?


गांधी नावाचे महात्मा, संपादन-रॉय किणीकर,

साहाय्यक-अनिल किणीकर,डायमंड पब्लिकेशन


ही अधोगती थांबवायची असेल तर राष्ट्रकारणास मानवतावादाचे अधिष्ठान दिले पाहिजे आणि राष्ट्रउभारणीकरता स्वाभिमान व स्वनिष्ठेचा मंत्र जागृत ठेवला पाहिजे.गांधीवादाची ही त्रिसूत्री आहे. तिचे प्रतिबिंब दैनंदिन व्यवहारात पडू शकेल असा एकसर्वव्यापी सर्वस्पर्शी कार्यक्रमही महात्मा गांधीनी सांगितला आहे.तो आजही उपयोगी पडण्यासारखा आहे.वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छता आणि मलमूत्र-शेणकाडी इत्यादी त्याज्य वस्तूंचा संपूर्ण उपयोग हा तो कार्यक्रम होय.केवळ वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छतेने गरीब जीवनही किती तरी प्रसन्न करणे शक्य आहे.केवळ स्वच्छतेने नव्वद टक्के रोगराई नष्ट होईल त्याकरता कोणाच्याही मदतीची गरज नाही. स्वच्छता ही ज्याने त्याने आपल्या घरात आणि गावात करण्याची गोष्ट आहे. पण म्हणूनच ती आम्हास नको वाटते. औषधाने भागते मग रोजची उठण्याबसण्याची स्वच्छता कशाला? आज औषधपाण्याचा,दवाखान्याचा प्रसार झाला आहे.परंतु वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छतेत फारसा फरक पडलेला दिसत नाही. सार्वजनिक आरोग्य सुधारलेले दिसते ते औषधाने, स्वच्छेतेने नाही.प्रत्येकाला आपल्या गावात दवाखाना हवा.परंतु गावातील दुर्गंधी नाहीशी करण्यास कोणी तयार नाही.मलमूत्र,शेणकाडी इत्यादी वस्तू नीट गोळा करून त्यांचा सेंद्रिय खताकरता उपयोग केला तर गावातील दुर्गंधी जाईल,रोगराई नष्ट होईल आणि शिवाय शेतीच्या उत्पादनास हातभार लागेल.हेकरण्याकरता कोणाची मदत लागत नाही.हे आपले आपण करावयाचे आहे.भूमीतून आपण जो सत्त्वांश घेतो तो भूमीस परत करावयाचा आहे.तसे केले तर हीच भूमी आपणास अधिक आधार देईल.इतके हे साधे तत्त्व आहे.मग ते आपण का करीत नाही?कारण स्वावलंबन, स्वाभिमान, स्वनिष्ठा यासंबंधी लोकशिक्षण व लोकजागृती करण्यापेक्षा परकीयांकडून रासायनिक खते भीक मागून आणणे सरकारला सोपे वाटते आणि मलमूत्र-शेणकाडी यांचा रोजचा व्यवहार करण्यापेक्षा सल्फेटचे पोते उघडून टाकणे शेतकऱ्यास सोईचे वाटते.हे आज सुखकर वाटणारे परावलंबन परिणामी आत्मघाती ठरल्याखेरीज रहाणार नाही.हीच गांधीवादाची मुख्य शिकवण आहे.स्वाभिमान,स्वनिष्ठा आणि त्यांचे प्रतिबिंब दैनंदिन जीवनात पडू शकेल असा सर्वव्यापी,सर्वस्पर्शी कार्यक्रम हाच गांधीवादाचा आशय आहे.त्याचे आज पुनरुत्थान झाले पाहिजे.

१८/११/२५

शांत मनाचा स्पायनोझा / Spinoza of peace

तो आमच्या प्रार्थनांमुळे जय किंवा आमच्या शत्रूच्या प्रार्थनांमुळे अपराजय देत नसतो.आपणास जे सत् व असत् वाटते,त्याच्याशी त्या परमात्म्याला काही एक करावयाचे नाही,जे निर्माण केलेच पाहिजे असे परमेश्वराला वाटते ते तो आपल्या अनंत बुद्धीला योग्य वाटणाऱ्या नियमानुसार निर्माण करतो. या विश्वाला गतिमान ठेवणारे शाश्वत व सनातन यंत्र म्हणजे ईश्वर,पण या यंत्राला प्रेरणा देणाराही तोच व या यंत्राचे नियमन करणारी इच्छक्तीही तोच आणि शाश्वत गतिमान व शाश्वत प्राणमय अशा या शक्तियंत्रातले आपण सारे आवश्यक असे भाग आहोत आणि त्या अनंत शक्तिमान यंत्रालाच आपण अधिक सुटसुटीत नाव न सापडल्यामुळे ईश्वर म्हणून संबोधितो.


ईश्वरी इच्छा म्हणजेच निसर्गाचा कायदा.प्रकाश ताऱ्यांताऱ्यांपर्यंत सारखा फिरत आहे.मनुष्याची जाणीवशक्ती सारखी काम करीत आहे.कारण ती सर्व ईश्वरी इच्छेचा कायदा मानतात.प्रकाश प्रकाशाचा आवश्यक कायदा मानतो.मनुष्याची जाणीव जीवनाचा कायदा मानते.आपली मानवी इच्छाशक्तीही आवश्यक अशा नियमांचे पालन करते,जगात फ्री वुइल किंवा इच्छास्वातंत्र्य अशी चीज नाहीच.आपण परिस्थितीची बाळे आहोत.परिस्थिती आपणास बनवते.स्पायनोझा लिहितो,'आपल्या मनात केवळ 'सर्वतंत्रस्वतंत्र' असे काहीच नाही.आपणास इच्छास्वातंत्र्य नाही.आपण जी काही इच्छा मनात करतो,ती कोणत्यातरी कारणामुळे असते.त्या कारणाला दुसरे कारण असते.त्या दुसऱ्या कारणाला तिसरे कारण असते.अशा प्रकारे कार्यकारणपरंपरा अनंत असते.' दुसऱ्या शब्दांत हेच सांगायचे तर असे म्हणता येईल की, आपल्या तोंडावरचे भाव किंवा शरीराचे स्नायू यांच्याप्रमाणेच आपली सारी कर्मेही नैसर्गिक शक्तींवरच अवलंबून असतात. या नैसर्गिक शक्ती आपली कल्पनाशक्ती भूतकाळात मागे पाहू शकेल तेथपासून सारख्या चालूच आहेत. अनंत काळापासूनच म्हणा ना! निसर्गाच्या नियत नियमाप्रमाणे असे कायमचेच ठरलेले आहे की,दैवी संगीत लिहिण्याला बीथोव्हेन जन्मावा. लाखो लोकांना हिंसक मरणाकडे नेण्याला नेपोलियन निर्माण व्हावा.आकाशातून खाली पडणाऱ्या पावसाला स्वातंत्र्य नाही.अगर धनुष्यापासून सुटलेल्या बाणाची दिशा बदलता येत नाही.त्याचप्रमाणे आपली कर्मेही नियतच आहेत.आपली इच्छा असो नसो ती तशीच हातून घडावयाचीच.बाणाची गती व मानवाचे कर्म यात फरक इतकाच की,मानवाला आपल्या कर्माची जाणीव असते.स्वकर्माचे भान असते आणि या केवळ जाणिवेलाच तो चुकून आपली इच्छाशक्ती मानतो.आपण काय करतो ते आपणास माहीत असते.पण ते करणे भागच असते..तद्विपरीत वागण्याचे सामर्थ्य वा स्वातंत्र्य आपणास नसते.आपण आपल्या नियतीशी निबद्ध आहोत.


आपल्या जीवनाच्या या छोट्या नाटकात केवळ प्रेक्षक म्हणून राहण्यास आपणास परवानगी आहे.पण त्यात ढवळाढवळ करायला,तिथे लुडबुड करण्यास,आपली इच्छा सोडण्याला आपणास परवानगी नाही.आपल्या कर्माकडे पाहण्याची आपणास पूर्ण मुभा आहे.पण आपली कर्मे आपणच ठरवतो असे जे आपणास वाटते ते मात्र चूक आहे.आपण जे काही निर्णय घेतो ते केवळ आपल्याच भूतकाळाचे, गतजन्मीचे परिणाम नसून आपल्या सर्व पूर्वजांच्या मागील जन्मांचा तो परिणाम असतो.


म्हणून स्पायनोझा शेक्सपिअरच्या अपूर्व बुद्धिमत्तेबद्दल त्याची स्तुती करीत नाही किंवा खुनी माणसाने केलेल्या गुन्ह्यांसाठी त्याच्यावर रागावत नाही.तो लिहितो, 'आपणाकडून दुसऱ्यांचा उपहास होऊ नये,तसेच स्वतःला कधीही दुःख होऊ नये.

आपणाकडून कोणीही तिरस्कारिला जाऊ नये म्हणून मी फार जपतो.मानवी मनुष्यांच्या हातून होणारी नानाविध कर्मे समजून घेण्याचा प्रयत्न मी काळजीपूर्वक केला आहे.' तो गुन्हेगाराला शासन करील;पण सूडबुद्धीने मात्र नव्हे,तर त्याच्यापासून समाजाचे रक्षण व्हावे म्हणून.थंडगार वाऱ्यामुळे पडसे आले म्हणून काय आपण वाऱ्यावर रागावतो ? त्या वाऱ्याविषयी आपली जी उदासीन, अनासक्त भावना असते.तीच स्पायनोझा आपल्या निंदकांविषयी व अपायकर्त्यांविषयी ठेवी.त्याची एक प्रकारची शास्त्रीय अनासक्ती असे.कार्यकारणभावाच्या अनंत साखळीतील प्रत्येक वस्तू अपरिहार्य असा दुवा आहे,हे त्याने जाणले होते.तो प्रत्येक नैसर्गिक कर्म वा मानवी कर्म शाश्वततेच्या प्रकाशात पाहतो व अविचल राहतो.अशा प्रकारे शाश्वततेच्या आरशात पाहिल्यावर स्पायनोझा आपणास जसे पाहतो.त्याप्रमाणे आपण आपणास पाहण्याची खटपट करू या.प्रत्येक सजीव वस्तू ईश्वराचाच अंश आहे. काळाच्या पृष्ठावर साकार रूपाने,मूर्त रूपाने,प्रकट झालेला ईश्वराच्या अमर महाकाव्यातील विचार म्हणजे प्रत्येक जीव.पृष्ठ नष्ट झाले की काव्याचे मूर्त स्वरूप नष्ट होते,अदृश्य होते. पण तो विचार अदृश्य झाला तरी मरत नाही.होमरची कविता असलेले पुस्तक फाटले,म्हणजे होमरची कविता नष्ट झाली असे होत नाही.त्या कवितेचे केवळ ते मुद्रण नष्ट होते.होमरचे विचार अनेक पृष्ठांवर छापलेले आहे. ती पृष्ठे नष्ट करता आली,तरी ते विचार नष्ट करता येणार नाहीत.शरीर मरते,


पण आत्मा राहतोच.रूपक बदलून असे म्हणता येईल की,प्रत्येक जीव म्हणजे जीवनाच्या कॅलिडोस्कोपमधील रंगीत काचेचा एक तुकडा आहे. पुन्हा रूपक बदलून असेही म्हणता येईल की,

ईश्वराचा आत्मा,तो परमात्मा किंवा ईश्वरी योजना म्हणजे एक सूर्य आहे व मानवी शरीर म्हणजे पंकिल पल्वल आहे. ते तळे आटले - म्हणजेच हे शरीर मेले की सूर्याचे प्रतिबिंब नाहीसे होते.पण सूर्य पहिल्याप्रमाणेच तेजाने तळपत असतो.दुसऱ्या शब्दांत बोलायचे तर असे म्हणता येईल की,प्रत्येक मानवी प्राणी म्हणजे दैवी ब्रह्माचा अंश आहे.व्यक्ती मरते म्हणजे बिंदू सिंधूत मिळून जावा त्याप्रमाणे आत्मा परमात्म्यात विलीन होतो.एखादी तान महासंगीतात विलीन व्हावी तसा आत्मा परमात्म्यात मिळून जातो.क्षणभर दिक्कालात आलेला स्थानबद्ध झालेला तो भव्यदिव्य विचार पुन्हा शाश्वततेच्या योजनेत जाऊन बसतो.


'शरीरनाशाबरोबर मानवी मनाचा संपूर्ण नाश होणे शक्य नाही.... सद्गुणी आत्मे ईश्वरी अंशाचे असल्यामुळे दैवी ज्ञानाचे अंशभाक असल्यामुळे चिरंजीवच आहेत.'


मानवी प्राणी म्हणजे इतस्ततःविखुरलेले पृथक् व अलग जीव नव्हेत.प्रत्येक केवळ स्वतःसाठी धडपडणारा व स्वतःपुरता जगणारा नाही.आपण सारे त्या दैवी ब्रह्माचे संबद्ध भाग आहोत.आपणास माहीत असो वा नसो, आपण सारे एकाच ध्येयासाठी धडपडत आहोत.आपण सर्व एकाच कुटुंबाचे घटक आहोत.एवढेच नव्हे,तर आपण एकाच विराट शरीराचे अणू आहोत.अगदी क्षुद्रतम माणसावर केलेला प्रहारही सान्या मानवजातीच्या शरीरावरील आघात होय. एखाद्या क्षुद्र व्यक्तीविरुद्ध केलेला अन्याय साऱ्या मानवजातीवरीलच अन्याय होय.जो आपल्या सर्व मानवबंधूंना सहानुभूती दाखवतो,जो सर्वांवर प्रेम करतो,तो जीवनाच्या स्वरूपाशी सुसंवादी आहे,असे म्हणावे.स्पायनोझाच्या मताचा 


वॉल्ट व्हिटमन् लिहितो,'सहानुभूतिशून्य हृदयाने तुम्ही एक फर्लांग चाललात,तर आपले कफन पांघरून तुम्ही आपलीच प्रेतयात्रा काढली,असे म्हणण्यास हरकत नाही.'


दुसऱ्याचे सुख वाढवून त्यायोगे स्वतः सुख मिळवणे हे मानवी जीवनाचे साध्य आहे.'शहाणा माणूस जी गोष्ट दुसऱ्यासाठी इच्छित नाही ती तो स्वतःसाठीही इच्छित नाही.'अल्पसंतुष्ट असणे,द्वेषाची परतफेड प्रेमाने करणे, दैवाने जे जे भोगावे लागेल ते ते आनंदाने व धैर्याने हसत हसत सहन करणे म्हणजेच भले जीवन,अर्थात स्पायनोझाच्या मते प्रज्ञावंतांचा संपूर्ण मार्ग अगर श्रेष्ठांचा निर्दोष मार्ग होय.मुख्य गोष्ट ही की,सर्व जगाशी एकरूप होऊन राहण्यात आनंद मानावयास शिका. तुमचे तसेच तुमच्या शेजाऱ्याचे जीवन कितीही क्षुद्र असले तरी,या विश्वाच्या विराट वस्त्रातील ते आवश्यक असे धागे आहेत, हे कधीही विसरू नका.आपल्या मनाचे सर्व निसर्गाशी ऐक्य आहे याची जाणीव वा याचे ज्ञान असणे ही परम मंगल व कल्याणप्रद गोष्ट. होय.' हे जग तुमच्यासाठी केलेले नसले, तरी निदान तुम्ही तरी या जगासाठी केले गेले आहात. तुम्ही या जीवनाच्या ग्रंथांतील एक महत्त्वाचे पृष्ठ आहात. तुम्ही नसाल तर तो अपूर्ण व अपुरा राहील हे विसरू नका.


स्पायनोझाचे जीवन अतिसुंदर व रमणीय,पण फारच अल्प होते.एका जागेहून दुसऱ्या जागी असा तो सारखा फिरत होता.शेवटी हेग येथे एका मित्राच्या घरी तो राहिला.त्याच्या हयातीतच हे घर यात्रेचे ठिकाण झाले. स्पायनोझाच्या दर्शनाला त्याच्या काळातील सारे महाबुद्धिमान,प्रज्ञावंत व प्रतिभाशाली लोक येत.तो आपल्या काळातील महर्षी होता.बुद्धिमंतांचा राणा होता.या घरातच तो बसे.आजूबाजूला शारीरिक व्यवसायाची हत्यारे पडलेली असत.त्याच्या अंगावर साथे कपडे असत.

कपड्यांबाबत तो एकदा म्हणाला, 'शरीर ही काय फार मोलाची वस्तु आहे? ही साधी वस्तू फार मौल्यवान कपड्यात कशाला गुंडाळायची?' येथे बसून तो मित्रांचे स्वागत करी,येथेच बसल्याबसल्या त्याने ते अमर नीतिशास्त्र लिहिले,हा ग्रंथ त्याचे हस्तलिखित त्याच्या मित्रांनी वाचले होते व समक्ष तोंडी, तशीच पत्रांनी त्यांनी त्यावर चर्चा केली होती.हा ग्रंथ त्याच्या मरणोत्तर छापला गेला.फ्रान्स व हॉलंड यांचे युद्ध या वेळी चालले होते.

राज्यकर्त्यांच्या महत्त्वाकांक्षा व सेनापतींच्या हालचाली व हुलकावण्या यांकडे त्याचे लक्ष नसे.त्याला त्यांची गोडी नव्हती.त्याला शत्रूविषयी देशबांधवांइतकाच आदर वाटे.त्याचा आनंद एकच होता,तो म्हणजे तत्त्वज्ञानविषयक.


एकदा तर एखाद्या निष्पाप मुलाप्रमाणे,एखाधा विश्वप्रेमी संताप्रमाणे तो शत्रुसैन्याच्या सेनापतीने बोलावल्यावरून शत्रूच्या गोटात गेला.सेनापती प्रिन्स कोडे याला स्पायनोझाशी थोडी तात्त्विक चर्चा करायची होती,थोड्या तात्त्विक गप्पा मारायच्या होत्या.त्या वेळी तो चुकून शत्रूचा हेर म्हणून फाशीच दिला जाणार होता.आपण देशद्रोही नाही,अशी आपल्या देशबांधवांची खात्री पटविण्याच्या कामी सुदैवाने त्याला यश आले म्हणून बरे.आपण निरुपद्रवी ज्ञानोपासक आहोत हे त्याने पटवून दिले म्हणूनच त्याचे प्राण वाचले.पण त्याचे प्राण फार दिवस वाचायचे नव्हते.त्याची प्रकृती झपाट्याने खालावत होती.१६७७ सालच्या हिवाळ्यात त्याची खालावलेली प्रकृती अधिकच खंगली व फेब्रुवारीच्या बाविसाव्या तारखेस तो मरण पावला. त्याच्या घराचा मालक व त्याच्या घराची मालकीण चर्चमध्ये गेली होती.त्याचा वैद्य तेवढा त्याच्याजवळ होता.त्याने टेबलावर असलेले सर्व पैसे लांबवले. चांदीच्या मुठीचा एक चाकूही गिळंकृत केलाआणि मृतदेह तसाच टाकून तो निघून गेला.स्पायनोझा हे पाहायला असता तर पोट धरून हसला असता.मरणसमयी त्याचे वय फक्त चव्वेचाळीस वर्षांचे होते. त्याच्या मनोबुद्धीचा पूर्ण विकास होण्याची वेळ येत होती.तो परिणतप्रज्ञ होत होता.अशा वेळी घाला आला आणि तो गेला.पण रेननच्या शब्दात म्हणू या की, 'ईश्वराची अत्यंत सत्यमय दृष्टी आजपर्यंत जर कोणी दिली असेल,तर ती स्पायनोझाने.ती दृष्टी देऊन तो गेला.'शोरमॅचर लिहितो,'विचाराच्या क्षेत्रात स्पायनोझा अद्वितीय आहे.त्याच्याजवळ कोणीही जाऊ शकत नाही.तो आपल्या कलेचा स्वामी आहे.या क्षुद्र जगाच्या फार वर तो आहे.या क्षुद्र जगात त्याला अनुयायी नाहीत व कोठेही नागरिकत्व नाही.तो जणू या जगाचा नाहीच.'


असे म्हणतात की,इतिहासात खरे निर्दोष ख्रिश्चन दोनच होऊन गेले.येशू व स्पायनोझा आणि दोघेही ज्यूच होते.

१६/११/२५

शांतमनाचा स्पायनोझा / Spinoza of peace

स्वतःविषयी युरोपीय पंडितांनी चांगले लिहावे-बोलावे यासाठी चौदावा लुई लाचलुचपती देत होता.पण स्पायनोझाला तो पेन्शन द्यावयास तयार होता.अट एकच होती.या ज्यू तत्त्वज्ञान्याने आपले पुढचे पुस्तक लुईला अर्पण केले पाहिजे.पण ज्याच्याविषयी स्पायनोझाला आदर वाटत नसे त्याची खुशामत करण्याइतका क्षुद्रमती तो नव्हता.तो प्रामाणिक होता. त्याला आत्मवंचना करावयाची नसल्यामुळे त्याने लुईचे म्हणणे नम्रपणे;पण निश्चितपणे नाकबूल केले.


(अ‍ॅमस्टरडॅम येथील शांतमना स्पायनोझा,मानवजातीची कथा हेन्री थॉमस,अनुवाद-साने गुरुजी,मधुश्री पब्लिकेशन)


याच सुमारास जर्मनीतील एक राजा कार्ल लुडविग याने स्पायनोझाला हीडलबर्ग येथील विद्यापीठात तत्त्वज्ञानाच्या प्राध्यापकाची जागा देऊ केली,पण एका अटीवर.'स्टेटच्या प्रस्थापित धर्मावर त्याने कधी टीका करता कामा नये.

स्पायनोझाने ती जागा साभार नाकारली.उपाशी राहावे लागले तरी हरकत नाही.पण सत्यच बोलायचे असे त्याने ठरवले.त्याच्यासमोर असल्या सुवर्णसंधी नाचत असता त्याला खरोखरच अर्धपोटी राहावे लागत होते.पैसे समोर खुळखुळत होते तरी त्याने ते नाकारले.कधीकधी तो गव्हाच्या अगर दुसऱ्या कसल्या पिठाची नुसती कांजी पिऊनच दिवस काढी.चव यावी म्हणून तो तीत थोडे बेदाणे व थोड्या मनुका टाकी.अजिबात उपाशी राहण्याचा प्रसंग येऊ नये यासाठी त्याला पै न् पै जपून खर्चावी लागे.चांगले व पोटभर अन्न तर मिळत नव्हतेच; पण बौद्धिक श्रम मात्र भरपूर होत असल्यामुळे त्याला क्षय होणार असे दिसू लागले.पण ईश्वरप्रेमाने मस्त असणारा हा निग्रही तत्त्वज्ञानी राजांचे साह्य नाकारीत होता.तशीच निकटवर्ती मित्रांचीही मदत स्वीकारीत नव्हता.दुसऱ्यांची श्रद्धा व दुसऱ्याचे पैसे घेणे म्हणजे जणू अधर्म असे त्याला वाटे.पोटासाठी तो चश्म्याच्या काचा घासून देई व मिळणाऱ्या फुरसतीच्या वेळात आपले विचार अधिक स्वच्छ व सतेज करी.कसे जगावे हे दुसऱ्यांना शिकविण्यासाठी तो आपले विचार घाशी व स्वतःला जगता येण्यासाठी चश्म्यांच्या काचा घाशी.


अशा अभंग व अविचल चारित्र्याचे लोक इतिहासात फार विरळा ! त्याचा आत्मा अत्यंत बलवान होता.तो अगदी एकाकी असा राहत होता.त्याच्या वयाच्या चोवीसाव्या वर्षी त्याच्या धर्मबांधवांनी त्याला बहिष्कृत केले होते.त्याने कोणताही पंथ (वा चर्च) न पत्करता स्वतःचा सर्व चर्चेस् व सायनागॉग ज्याच्या पोटात येऊ शकतील असा स्वतंत्र विश्वव्यापक धर्म निर्माण केला. त्याला सर्व विश्वात विश्वंभर भासत होता.तो बंडखोर होता.पण त्याचे बंड विशिष्ट प्रकारचे होते.त्याच्या बहिणीने त्याचा वारसा लुबाडला होता.त्याने तिला कोर्टात खेचले व खटला जिंकला.पण पुन्हा सारी इस्टेट त्याने तिलाच परत दिली.


कन्फ्यूशियसप्रमाणे त्यालाही अपकारांवर वा अपायांवर रागावण्यास मुळीच वेळ नव्हता.अपकार वा अपाय करणाऱ्यांवर रागावण्याइतका क्षुद्र तो नव्हता.तो स्वतःचा इतका अधःपात होऊ देत नसे.दुसऱ्यांवर रागावण्याइतका खाली तो कधीही येत नसे.अ‍ॅमस्टरडॅम येथील ज्यू धर्मोपदेशकांनी त्याच्यावर बहिष्कार घातला व 'याच्याशी संबंध ठेवू नका.याला एखाद्या कुत्र्याप्रमाणे वागवा.'असे त्यांनी सर्व ज्यूंना आज्ञापिले,तरी त्यांच्यावर न रागावता स्पायनोझा त्यांना सोडून व आपली जात सोडून निघून गेला.'ज्यू राबींना जे मोलवान वाटत आहे. त्याचे ते रक्षण करीत आहेत.मला ते बहिष्कृत न करतील तर स्वतःच्या धर्माशी प्रतारणा केल्याचे पाप त्यांना लागेल.पण ज्यू धर्मोपदेशकांचे वर्तन त्यांच्या धर्मकल्पनेनुसार योग्य असले,तरी माझे वर्तनही माझ्या विचारसरणीनुसार योग्यच आहे व मी वागलो तसा न वागतो तर माझ्या हातून माझ्या आत्म्याची फसवणूक झाली असती.'अशी त्याची विचारसरणी असल्यामुळे ज्यूंनी त्याची ताबडतोब केलेली हकालपट्टी त्याच्या मते तर्कदृष्ट्या योग्यच होती.तो आता एकटाच राहिला. धर्महीन लोकांत फेकला गेला.त्याचा ज्यूंच्या धर्मावरचा विश्वास साफ उडाला होता.


ज्यूंनी बहिष्कृत केल्यावर त्याने आपले मूळचे 'वरुच' नाव बदलून 'बेनेडिक्ट' केले.स्पायनोझाचे तत्त्वज्ञान कब्बालाच्या गूढवादावर उभारलेले आहे व त्याचे नीतिशास्त्र जगातील प्रॉफेट्सच्या लिखाणांपासून मिळालेल्या स्फूर्तीतून जन्माला आले आहे.


धर्माभ्यासात तो ग्रॅज्युएट झाला.पण पास होताना जास्तीतजास्त अपमान त्याच्या वाट्यास आला. धर्माभ्यासानंतर त्याने लॅटिनच्या व इतर धर्मोपदेशकांच्या तत्त्वज्ञानाचा अभ्यास आरंभिला.व्हॅन डेन नामक डच पंडित त्याला लॅटिन शिकवीत असे. एन्डे भाषाकोविद व व्युत्पत्ति

शास्त्रज्ञ होता.धर्माच्या बाबतीत तो नास्तिक होता.पुढे काही वर्षांनी चौदाव्या लुईची त्याच्यावर अवकृपा झाली व त्याला सार्वजनिकरीत्या फाशी जाण्याचा मान लाभला.


व्हॅन डेन एन्डेची मुलगी स्पायनोझाला शिकण्यात मदत करीत असे.स्पायनोझा तिच्या मार्गदर्शनाचे लॅटिनच नव्हे तर प्रेमही शिकला.आपण ज्यू आहोत हे विसरून त्याने तिला लग्न करण्याची विनंती केली.तेव्हा तिने त्याचे ज्यूपण त्याच्या ध्यानी आणून दिले व स्वतःच्या कर्करिंग नामक दुसऱ्या एका विद्यार्थ्याशी लग्न केले.तो तिच्याच धर्माचा असून हँबूर्ग येथे त्याचा फायदेशीर धंदा होता.


प्रेमाचा हा असा अनुभव आला.त्यामुळे तो शहाणा झाला व आपल्या विफल प्रेमापासून अमूर्तच्या प्रेमाकडे वळला.त्याने प्लेटो,स्टोइक व एपिक्युरियन पंथांचे तत्त्वज्ञानी,त्याचप्रमाणे त्याच्या वेळेपर्यंत झालेले सर्व तत्त्वज्ञानी वाचून काढले.


गिऑर्डानो ब्रूनो हा विश्वी विश्वंभर मानणारा होता.त्याच्या तत्त्वज्ञानाचा स्पायनोझावर बराच परिणाम झाला.ब्रूनोला नवीन विचार करणारा म्हणून जाळण्यात आले.तसेच डेकार्टासच्या गणितातील अमूर्त तत्त्वांनीही तो आकृष्ट केला गेला.सनातनी विचार प्रकट करण्याबद्दल डेकार्टसला राजा महाराजांकडून मानसन्मान मिळाले होते.स्पायनोझाचे

मन अतिशय विशाल होते.तो जे जे वाची ते सर्व स्वतः पचवून टाकी.शेवटी,त्याचे तत्त्वज्ञान एक प्रकारचा ज्यू गूढवादच झाले.त्याला प्लेटोच्या विचारांचाही रंग होता.एपिक्युरसच्या संशयवादाचीही थोडीशी छटा होती.व इटालियन हुतात्मा ब्रूनो यांच्या अद्वैत तत्त्वज्ञानानेही त्याला थोडा आकार दिला होता. फ्रेंच तत्त्वज्ञानी डेकार्टस याच्या गणिती परिभाषेतून स्पायनोझाचे तत्त्वज्ञान जगासमोर मांडले गेले. स्पायनोझाने आपली सारी पुस्तके सिसरोनियन लॅटिनमध्ये लिहिली.

त्याच्या बुद्धीइतकी विशाल व व्यापक बुद्धी इतिहासात फारच कचित दिसते.पण स्पायनोझाचे नीतिशास्त्र वर लिहिण्याप्रमाणे इसापचे नीतिशास्त्र होते.


वयाच्या अठ्ठावीसाव्या वर्षी आपले जन्मगाव अ‍ॅमस्टरडॅम सोडून तो लंडन शहराजवळच्या हिन्स्बर्ग उपनगरात येऊन राहिला.येथे प्राचीन इझायल ऋषीप्रमाणे तो शरीरश्रमाने पोटाला मिळवी व उरलेला वेळ जीवनाचे,तसेच ईश्वराचे कोडे उलगडण्यात घालवी जीवनाचा अर्थ काय,याचा विचार करीत तो बसे. आपसात लढणाऱ्या कोळ्यांची भांडणे पाहून त्याच्या डोळ्यांतून अश्रुधारा वाहू लागत,गाल ओले होते.होता होईतो तो कधी प्रक्षुब्ध होत नसे. ₹पण मालकिणीने त्याच्या खोलीतील कोळिष्टके झाडून टाकली,तर मात्र त्याला जरासा राग येई.कोळ्यांच्या जाळ्यांकडे पाहत असता तो मनात आपल्या तत्त्वज्ञानाचे चिंतन करीत बसे.त्याचे पहिले पुस्तक धर्मावर होते.त्याचे नाव (A Treatise on Religion and Politics.) त्यात त्याने बायबलवर टीका केली होती.जुन्या करारातील ईश्वराला रजा देऊन त्याने स्वतःच्या नव्या करारात अधिक दयाळू प्रभू निर्माण केला.स्पायनोझाचे हे नवे पुस्तक,हा त्याचा नवा करार म्हणजेच त्याचे सुप्रसिद्ध नीतिशास्त्र होय. भूमितीच्या पद्धतीने स्पायनोझाने लिहिलेले हे बायबल आहे.अध्यात्म गणितात बसविण्याचा त्याचा हा प्रयत्न आहे.हा अदृश्य जगाचा फोटो आहे.हे शाश्वततेच्या सांगाड्यात बसवलेले जीवनाचे चित्र आहे.


कोणीतरी म्हटले आहे की,अध्यात्मशास्त्राचा अभ्यास म्हणजे अंधाऱ्या खोलीत तिथे नसलेले मांजर शोधीत बसण्यासारखे आहे.पण दुसरे काही म्हणतात की,ज्ञात जगाच्या अभ्यासाइतकाच अज्ञात जगाचा अभ्यासही महत्त्वाचा आहे आणि आजचे अध्यात्मच उद्याचे सृष्टिशास्त्र होईल.

शास्त्रज्ञ पाऊल टाकण्यास भितात,तिथे आपण वारंवार घुसू पाहत असतो हे तत्त्वज्ञानी कबूल करतात.पण त्यांचे म्हणणे असे असते की, तत्त्वज्ञान्यांनी ज्या अंधारात उड्या मारल्या.त्याचेच फळ म्हणजे विज्ञानातील मोठमोठे शोध.अंधारातील त्या उड्यांतूनच विज्ञान जन्मले आहे.


तत्त्वज्ञानाची प्रत्यक्ष उपयुक्तता किती आहे या वादात न शिरता स्पायनोझाच्या अध्यात्मसिंधूत आपण बुडी घेऊ या.पण आपण फार पुढे मात्र जावयाचे नाही.बुडणार नाही इतपतच खोल पाण्यात आपण जायचे.प्रत्यक्ष सृषष्टीच्या किनाऱ्यापासून फार दूर जायचे नाही. किनारा डोळ्यांसमोर ठेवायचा असे ठरवून या समुद्रात शिरू या.बुडी घेऊ या.आपणा सर्वांना नेहमी सोडवावेसे वाटणारे दोन प्रश्न स्पायनोझासमोरही होते.कोणते बरे प्रश्न ?


१. या जगात आपणास कोणी जन्माला घातले ?


२. येथे आपण काय करायचे?


या प्रश्नांची उत्तरे मिळावी म्हणून तो ईश्वराचे स्वरूप तपासू लागला.ईश्वराचे स्वरूप,विश्वाची रचना,मानवाचे मन या तिहींचे पर्यालोचन त्याने सुरु केले.तो अशा निर्णयाला आला की,ईश्वरात सारे आहे व ईश्वर सारे व्यापून आहे.ईश्वर म्हणजे सृष्टी निर्माण करणारे परम ज्ञान,त्या ज्ञानाने उत्पन्न होणारे हे जगही तोच आहे. परमेश्वर म्हणजे सनातन स्त्रष्टा,चिरंजीव व अमर कलावान.

काळाच्या खटक खटक करणाऱ्या भव्य मागावर सृष्टी,चंद्र,सूर्य ताऱ्यांचे व नाना ज्योतिर्गोलांचे तेजस्वी वस्त्र तो विणीत असतो व स्वतःच ते पांघरतो.हे दृश्य विश्व म्हणजे प्रभूचे शरीर आहे आणि विश्वाला चालना देणारी प्रेरणा,अंतःशक्ती व अंतःस्फूर्ती म्हणजे त्या प्रभूचे मन.पण शास्त्रज्ञ 'वस्तू व वस्तूंतील शक्ती एकरूप आहेत.' असे म्हणतो.त्याप्रमाणेच प्रभूचे हे शरीर व त्याचे मन एकरूप आहेत.दुसऱ्या शब्दांत हेच सांगावयाचे झाले,तर ईश्वर म्हणजेच हे अनंत विश्व व अनंत ज्ञान.ईश्वर म्हणजेच विश्व प्रत्येक पर्णात,मातीच्या प्रत्येक कणात, प्रत्येक प्राणिमात्रात मग तो कितीही क्षुद्र असो व सर्व चराचरात परमात्मतत्त्व आहे.


ईश्वराची दिव्यता चराचरातील अणुरेणूत आहे.आकाशातील अत्यंत तेजोमय गोल व पृथ्वीवरील एखादा भिकारी दोघांचीही या सृष्टीच्या महाकाव्यांत सारखीच जरुरी आहे.सृष्टीच्या महाकाव्यात ही दोन्ही अक्षरे सारखीच महत्त्वाची आहेत.


हे विश्वाचे महाकाव्य त्या अनंत ज्ञानाचे फळ आहे. मानवाच्या क्षुद्र इच्छा व त्याचे क्षुद्र कायदे यांना अनुसरून हे विश्वकाव्य रचण्यात येत नसते.ईश्वरी मनोबुद्धी व मानवी मनोबुद्धी यात बिलकुल साम्य नाही. जीवनाच्या नाटकात प्रभूने जे संविधानक योजलेले असेल ते आपल्या बुद्धीच्या कक्षेच्या पलीकडचे आहे.ते केवळ मानवाची दृष्टी ठेवून निर्मिलेले नाही.मानवाने त्यावर बरे की वाईट हा निर्णय देत बसू नये.नाक चष्मा ठेवण्यासाठी आहे असे म्हणणे अगर डासांनी चावावे म्हणून हातपाय आहेत असे म्हणणे जितके वेडेपणाचे, तितकेच हे विश्व आमच्यासाठी निर्मिलेले आहे असे म्हणणे हेही वेडेपणाचे आहे. मानवांनी आपल्या मर्यादित ज्ञानाने ईश्वराच्या अनंत ज्ञानावर आक्षेप घेऊ नये.


स्पायनोझाच्या मते ईश्वर हा एखादा लहरीनुसार वागणारा सृष्टीचा हुकूमशहा नसून तो जणू दैवी चित्कळा आहे.

स्पायनोझाचा ईश्वर कोठे स्वर्गात बसलेला नाही… राहिलेला शिल्लक भाग पुढील लेखामध्ये…