* विजय गायकवाड | Vijay Gaikawad

live

नमस्कार आपले स्वागत आहे. मी पुस्तके आणि मित्रांवर पैसे खर्च करतो,माझ्याकडे दगड आणि विटांवर खर्च करण्यासाठी पैसे नाहीत.- रस्किन बाँड.ही थोर माणसं व त्यांचे विचार मला पुस्तकात भेटलीत.ती भेटली आणि त्यांनी सांगितले कि, प्रत्येक दिवशी असं काही तरी करा की,ते तुम्हाला अधिक सुंदर उद्याच्या दिशेने खूप लांबवर घेऊन जाईल."- डोग फायरबाऊ.' सर्वियन कादंबरीकार मिलोराद पावीच यांचे एक वाक्य आहे ते म्हणतात - जोवर जगात पुस्तक वाचणाऱ्या वाचकांची संख्या बंदूकधारी सैनिका पेक्षा अधिक आहे तोवर काळजीच काहीच कारण नाही.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात.पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये.म्हणून अविरतपणे प्रयत्न करणारे मार्गदर्शक, मित्र धावून येतात.प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,डॉ.दीपक शेटे,आ.भरत बुटाले,प्रा.सर्जेराव राऊत,सुभाष ढगे,अनिल फारणे,डॉ.सुधीर सरवदे ,विश्वास खाडे, विनायक पाटील,संजय कुंभार,सतीश खाडे,मनोहर सुर्वे,गणेश खंदारे,तात्या गाडेकर, दादासाहेब गाडेकर, दादासाहेब ताजणे, पुस्तकातील घटना प्रसंग सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील यांनी केलेले आहे. मला लिहिण्याची प्रेरणा देणारी पुस्तके,लेखक,प्रकाशक,मित्र ही जगावेगळी माणसं माझ्या जीवनातील महत्वाचा टप्पा आहेत.... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ.मेघा गायकवाड, चिरंजीव मयान,माझ्या धावण्यातील गुरुवर्य नामदेव बरुरे,लुल्ला शेख मोठी ताई ,लहान ताई जयश्री शिंदे या सर्वांचेच मनापासून आभार व धन्यवाद मॅट्रिक फेल विजय गायकवाड

२७/११/२५

कामशास्त्राचा अवलिया रिचर्ड बर्टन / Richard Burton, the master of sex

नैतिक-अनैतिकतेच्या गुंत्यात अडकून न पडता आपल्या मर्जीनुसार जीवन जगणारे सर रिचर्ड बर्टन हे आयुष्याच्या अखेरपर्यंत जगभर भटकत राहिले. निरनिराळ्या देशांतील शारीरिक संबंधांबाबतच्या असंख्य अनिष्ट प्रथा त्यांनी पहिल्यांदा जगासमोर आणल्या.अशा या जगावेगळ्या 'इरॉटिक ट्रॅव्हलर' बद्दल…(कामशास्त्राचा अवलिया अभ्यासक रिचर्ड बर्टन,हटके - भटके,निरंजन घाटे,समकालीन प्रकाशन)


एकोणिसाव्या शतकात इंग्लडच्या समाजमनावर व्हिक्टोरियन चालीरीतींचा जबरदस्त पगडा होता. संस्कृतीच्या नावाखाली लोकांच्या वागण्याबोलण्यावर अनेक निर्बंध टाकले गेले होते.

शारीरिक संबंधांबाबत जाहीरपणे बोलणंदेखील असभ्य मानलं जात होतं, त्याविषयीची माहिती गोळा करणं तर दूरच राहिलं. अशा वातावरणात सर रिचर्ड बर्टन नावाचा एक इंग्रज अवलिया मात्र जगभर भटकंती करत याच विषयाची आश्चर्यकारक माहिती गोळा करून जगापुढे मांडत होता.त्यांनी सेक्सबाबतच्या जगभरातल्या अनेक प्रथा, चालीरीती,धारणा यांची बारकाव्यां -

सहित निरीक्षणं नोंदवली.समलिंगी संबंध,तसंच मुस्लिम समाजात असलेल्या स्त्रियांची सुंता करण्याच्या अघोरी पद्धतीसारख्या अनेक प्रथा अस्तित्वात आहेत हे जगाला प्रथमच कळलं ते सर बर्टन यांच्या निरीक्षणांवरूनच. आज या घटनेला सुमारे दीडशेहून अधिक वर्ष लोटली आहेत आणि आता कुठे जागतिक पातळीवर त्या अघोरी प्रथेविरुद्ध आवाज उठवला जात आहे.


सर रिचर्ड बर्टन यांनी निरनिराळ्या देशांतील दुर्गम भागात भटकंती केली.त्यांना या देशांमधल्या अनेक भाषा त्यातल्या बारकाव्यांसह अस्खलितपणे येत होत्याच,पण त्या भाषांतील साहित्याशीही त्यांचा परिचय होता.ते ज्या भागात जात तिथली स्थानिक भाषाही झटकन आत्मसात करत आणि स्थानिकांतलेच एक बनून राहत.

स्थानिक लोक त्यांना आपल्यातला एक मानून त्यांच्याशी निःसंकोच गप्पा मारत असत.त्यामुळे त्या भूभागातील स्त्री-पुरुष संबंधांतले बारकावे त्यांना अवगत होत.बर्टन त्या सर्व चालीरीती नोंदवून त्या जपून ठेवत असत.अफाट स्मरणशक्ती,तटस्थ दृष्टीने केलेलं निरीक्षण,बारकावे टिपण्याची वृत्ती आणि भावनात्मक वृत्तीचा अभाव यामुळे त्यांच्या नोंदी अतिशय अचूक असत.त्यांच्या अशा अनेक नोंदींचं संपादित संकलन म्हणजे एडवर्ड ली यांनी संपादित केलेलं 'द इरॉटिक ट्रॅव्हलर' हे पुस्तक. (त्यांनी जगभरातल्या कामशास्त्रावरचं साहित्य जमवून त्याचा अनुवादही पुस्तकरूपाने प्रसिद्ध केला आहे.हे प्रचंड गाजलेलं पुस्तक म्हणजे 'द अरेबियन नाइट्स' हा महाखंड.

त्यांच्या या कार्यामुळेच त्यांना पाश्चात्त्य जगात 'कामशास्त्राचा पहिला अनुवादक' तसंच 'सेक्युअल अँथ्रॉपॉलॉजिस्ट' अशीही प्रसिद्धी मिळाली आहे.)


'द इरॉटिक ट्रॅव्हलर' या पुस्तकातून सर रिचर्ड बर्टन यांचं आयुष्य उलगडत जातं तेव्हा 'सत्य हे कल्पितापेक्षा अद्भुत असतं' याचीच प्रचिती येते.रिचर्ड फ्रान्सिस बर्टनचा जन्म १९ मार्च १८२१ या दिवशी लंडन इथे झाला.त्याचे वडील लेफ्टनंट कर्नल जोसेफ नेटरव्हिल बर्टन यांना तीन मुलं.रिचर्ड सर्वांत मोठा.कर्नल बर्टन अत्यंत निर्भीड,स्पष्टवक्ते, तत्त्वनिष्ठ आणि वृत्तीने भटके होते.एका ठिकाणी फार काळ राहणं त्यांना आवडत नसे.या सर्व गुणांची देणगी त्यांनी त्यांच्या मोठ्या मुलाला वारसा म्हणून दिली होती.याच गुणांमुळे कर्नलसाहेबांना त्यांची सैन्यातली नोकरी गमवावी लागली होती.त्यांनी अपुऱ्या माहितीवर केवळ वरिष्ठ सांगतात म्हणून राणीविरुद्धच्या व्यभिचाराच्या खटल्यात साक्ष द्यायला नकार दिला होता.कर्नल बर्टननी वरिष्ठांची आज्ञा पाळली नाही म्हणून ड्यूक ऑफ वेलिंग्टननी त्यांना निम्म्या पगारावर सक्तीने निवृत्त करण्याची आज्ञा दिली.सुदैवाने कर्नल बर्टनच्या पत्नीला,मार्था बेकरला,माहेरहून खूप संपत्ती वारसाहक्काने मिळाली होती,त्यामुळे कर्नलसाहेब आरामात जगू शकले.


रिचर्डच्या भटकंतीला बालवयातच सुरुवात झाली. त्याचे आई-वडील फ्रान्समध्ये स्थायिक झाले.रिचर्ड आणि त्याच्या भावंडांचं औपचारिक शिक्षण झालंच नाही.तसंच त्यांच्या जगण्याला शिस्तही नव्हती. जसजसं वय वाढू लागलं तसतसे रिचर्ड आणि त्याचे भाऊ अधिकाधिक बेदरकार जीवन जगू लागले. समाजाला सत्याची कदर नसते,त्यांना देखावा महत्त्वाचा वाटतो,या निष्कर्षाप्रत रिचर्ड फार लहान वयातच पोहोचला होता.फ्रान्समध्ये काही वर्षं राहिल्यानंतर तिथे सुरू असलेल्या राजकीय उलाढालींमुळे बर्टन कुटुंब पुन्हा इंग्लंडमध्ये परतलं. तोपर्यंत रिचर्डने फ्रेंच भाषा आत्मसात केलेली होती.


बर्टन कुटुंब इंग्लंडमध्ये असताना रिचर्डला कांजिण्या झाल्या आणि कर्नलसाहेबांनी त्यांचा मुकाम परत फ्रान्समध्ये हलवला.तिथून एका वर्षातच ते इटलीस राहायला गेले.तिथेही ते स्थिरावले नव्हतेच.पण इटलीतल्या या मुक्कामात रिचर्ड आणि एडवर्ड या दोन्ही भावांनी इटालियन भाषेवरही प्रभुत्व मिळवलं.


इटलीतल्या वास्तव्याने रिचर्डला इतके विविध अनुभव दिले,की इतर सामान्य माणसाला त्याच्या संपूर्ण आयुष्यभरातदेखील एवढा अनुभव मिळणं कठीणच. त्या वेळी रिचर्ड फक्त सोळा वर्षांचा होता,इटलीतल्या नेपल्समध्ये कॉलऱ्याची साथ होती,त्या वेळी या दोन भावांनी साथीत मेलेल्यांची प्रेतं हातगाड्यांवर रचून त्या गाड्या स्मशानात नेण्याचं काम केलं होतं. नेपल्समध्येच असताना दोघांनी घराजवळच असलेल्या वेश्यागृहाची माहिती काढली आणि ते तिथे नियमित भेटी देऊ लागले.भावांच्या या बेदरकारपणामुळे त्यांचा वेश्यांबरोबरचा पत्रव्यवहार कर्नल

साहेबांच्या हातात सापडला.ते खवळले आणि त्यांनी नेपल्स सोडायचा निर्णय घेतला.ते आधी प्रॉव्हेन्स इथे,नंतर पिरनीज पर्वतराजीतील पाऊ या खेड्यात राहायला गेले. पाऊ हे पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्ध असलं तरी तो स्मगलरांचा अड्डा होता.त्या स्मगलरांच्या संपर्कात यायला या बंधूंना वेळ लागला नाही.तिथे येणाऱ्या पर्यटक मुलींना पटवणं हाही उद्योग या बंधूंनी आवडीने केला.आपल्या मुलांना उच्च शिक्षण देऊन चर्चच्या सेवेत दाखल करावं,असा एक अजब निर्णय या वेळी कर्नलसाहेबांनी घेतला.वडिलांच्या या निर्णयामुळे रिचर्ड ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या ट्रिनिटी महाविद्यालयात दाखल झाला.ग्रीक आणि लॅटिन शिकवणाऱ्या त्या महाविद्यालयात रिचर्डच्या पूर्वानुभवाचा उपयोग नव्हता.व्यावहारिक जगाचं ज्ञान,इंग्रजी-फ्रेंच आणि इटालियन बोलीभाषा अस्खलितपणे बोलता येणं,बुद्धिबळ आणि तलवारबाजीत प्रावीण्य यांचा नि ऑक्सफर्ड विद्यापीठाचा मेळ बसणं तसं अवघडच होतं. तोपर्यंतच्या आयुष्यात त्याचा आणि शिस्तीचाही कधी संबंध आलेला नव्हता,त्यामुळे लवकरच त्याची ऑक्सफर्ड विद्यापीठातून हकालपट्टी झाली.


विद्यापीठातून बाहेर पडल्यावर काय करायचं हा प्रश्न रिचर्डने स्वतःच सोडवला.त्या काळात रिचर्ड अरेबिक भाषेचा अभ्यासही करत होता.याच दरम्यान ईस्ट इंडिया कंपनीच्या सैन्याने अफगाणिस्तानमध्ये झालेल्या पराभवात बरेच अधिकारी गमावले असल्याने कंपनीने सैन्यभरती सुरू केली होती.हे रिचर्डला कळलं तेव्हा त्याने पाचशे पौंड एवढी रक्कम भरून बाँबे नेटिव्ह इन्फंट्रीमध्ये कमिशन्ड अधिकारी म्हणून नोकरी मिळवली.

लगेचच त्याने हिंदुस्तानी भाषा शिकण्यास सुरुवातही केली.चार महिन्यांच्या सागरी प्रवासानंतर, जून १८४२ मध्ये झुपकेदार मिश्यांचा हा रुबाबदार आणि देखणा अधिकारी मुंबई बंदरात उतरला.इथे आल्या आल्या काही दिवसांतच इथल्या इंग्रज अधिकाऱ्यांशी त्याचे खटके उडू लागले,याचं कारण रिचर्ड भारतीय वेश्यांच्या वस्तीत उघडपणे वावरायचा.

त्याने कुणाच्या लक्षात येणार नाही अशा त-हेने हे उद्योग करायला ब्रिटिश समाजाची हरकत नव्हती;पण कुठलीही गोष्ट चोरून करायची हे रिचर्डला मान्य नव्हतं.


भारतात आलेल्या सैन्याधिकाऱ्याला इथे आल्यावर सहा महिन्यांच्या आत हिंदुस्थानी भाषेची परीक्षा पास होणं आवश्यक असे.रिचर्ड त्या परीक्षेत पहिला आला.नंतर त्याने गुजराती आणि मराठी भाषेतही प्रावीण्य मिळवलं.


याच सुमारास सर चार्ल्स नेपियरनी सिंध प्रांत जिंकून घेतला होता.१८४४ च्या सुरुवातीस रिचर्डची रेजिमेंट सिंधला रवाना झाली.त्याला कराचीत मुख्य कचेरीत असलेल्या सिंधच्या सर्वेक्षण विभागात नियुक्ती मिळाली.इथे त्याने भारतीय चालीरीतींची नोंद ठेवायला सुरुवात केली.सामान्य भारतीयांचं जीवन हा त्याचा आवडीचा विषय बनला.


त्याचा रंग युरोपियन गोरा नव्हता.त्यातच त्याच्या भटकंतीमुळे तो रापला होता.त्यामुळे आणि भाषाप्रभुत्वामुळे स्थानिक बनून वावरणं त्याला सहज जमून जात होतं.त्याने कराचीमध्ये तीन विविध वस्तू भांडारं उघडली.या दुकानांमध्ये काम करत असताना तो गिऱ्हाइकांशी संवाद साधायचा.त्यामुळे त्याच्याजवळ माहितीचा खजिनाच जमा झाला.स्थानिक चालीरीती, सण-उत्सव,रस्त्यावरचे जादूगार आणि भटके यांच्याकडून धार्मिक माहितीबरोबरच लैंगिक समजुती, कामोत्तेजकं,युनानी औषधं,वैदूंची झाडपाल्याची औषधं यांची माहिती त्याने मिळवली.या नोंदींवर आधारित 


त्याचं पहिलं पुस्तक इ. स. १८५१ मध्ये प्रसिद्ध झालं. त्या पुस्तकाचं शीर्षक होतं,'सिंध अँड द रेसेस देंट इनहॅबिट द व्हॅली ऑफ इंडस, वुईथ द नोटिसेस अँड द टोपोग्राफी अँड हिस्टरी ऑफ द प्रॉव्हिन्स'. या पुस्तकात आणि नंतरही इतर पुस्तकांमध्ये बर्टनने एक नोंद वारंवार केल्याचं दिसून येतं. 


सिंध प्रांतातल्या स्त्रियांच्या निरीक्षणावरून बर्टनने म्हटलं आहे,की उष्ण आणि आर्द्र हवामानाच्या भूप्रदेशातील पर्वतराजीजवळ राहणाऱ्या स्त्रिया या त्या भागातील पुरुषांपेक्षा जास्त कामातुर आणि भावनिक असतात,तर थंड भूप्रदेशात नेमकी याउलट परिस्थिती दिसून येते.(त्यासाठी त्याने कुठलाही पुरावा दिलेला नसला तरी त्याच्या या निरीक्षणावर तो शेवटपर्यंत ठाम होता.) सिंध प्रांतातल्या समजुती, विशेषतःवशीकरणासाठी करण्यात येणाऱ्या जा‌देटोण्यावर बर्टनने या पुस्तकातील बरीच पानं खर्च केली असून त्यासाठीचे तांत्रिक विधी आणि मंत्रही दिले आहेत.

'सिंधी स्त्रिया दिसायला सुंदर असल्या तरी हिंदुस्तानात त्यांच्या चालचलणुकीबद्दल फारसं चांगलं बोललं जात नाही,' असं सांगून त्या कारणाने होणाऱ्या खूनखराब्याची काही उदाहरणंही तो देतो.सिंधसह वायव्य हिंदुस्तानातल्या पुरुषांकडून वापरल्या जाणाऱ्या सर्व प्रकारच्या कामोत्तेजकांचं बारकाव्यांसह वर्णनही त्याने केलं आहे.. स. १८४५ मध्ये सर चार्ल्स नेपियरना कराचीत पुरुष वेश्यागृहं आहेत असं कळलं.सर चार्ल्सनी 'याची सत्यता तपासून पाहावी'असं मध्यस्थामार्फत बर्टनला सुचवलं. तशी लेखी सूचना मात्र बर्टनला मिळाली नव्हती.त्याने त्याच्या नेहमीच्या पद्धतशीरपणे त्या प्रकरणाचा तपास करायला सुरुवात केली.तो 'मिर्झा अब्दुल्ला बशिरी' नावाचा एक व्यापारी बनून कराचीला पोहोचला. मिळालेल्या माहितीवर आधारित एक तपास अहवाल त्याने मुंबईस १८४७ मध्ये पाठवला.दुर्दैवाने त्या वेळी सर चार्ल्स राजीनामा देऊन मायदेशी परतले होते. त्यांची जागा घेतलेले गृहस्थ फारच सोवळे आणि सनातनी वृत्तीचे होते.हा अहवाल वाचून ते संतापले. त्यांनी रिचर्ड बर्टनच्या बडतर्फीचा हुकुमनामा जारी केला.बर्टन सैन्यात अधिकारी होता.त्यामुळे सैन्यातली त्याची हकालपट्टी जरी लगेच झाली नसली तरी त्याच्या एकूण सैनिकी कारकिर्दीवर मात्र याचा वाईट परिणाम झालाच.मात्र,बर्टनचा अहवाल म्हणजे समलिंगी संबंध आणि अल्पवयीन मुलांच्या लैंगिक वापराचा पहिला शास्त्रशुद्ध अभ्यास मानला जातो. बर्टन जगात जिथे जिथे गेला तिथे तिथे सर्व जमातींत त्याला या प्रकारचे लैंगिक संबंध आढळून आले.या निरीक्षणांवर त्याने 'टर्मिनल एसे' नावाचा एक प्रबंध लिहिला, जो पुढे त्यानेच लिहिलेल्या 'द अरेबियन नाइट्स' या प्रसिद्ध महाखंडातल्या दहाव्या भागात समाविष्ट केला गेला.सिंधमध्ये असताना वयाच्या पंचविसाव्या वर्षी बर्टनला कॉलरा झाला.त्या वेळी तो मरता मरता वाचला.


यातून सुधारण्यासाठी त्याला बराच काळ विश्रांती घेणं भाग होतं.त्यामुळे त्याला दोन वर्षांची रजा मंजूर करण्यात आली.या आजारपणाच्या रजेत विश्रांतीसाठी त्याला उटकमंड इथे सरकारी खर्चाने पाठवण्यात आलं. तेव्हा उटकमंड मद्रास इलाख्यात होतं.तिकडे त्रिवेंद्रममार्गे जायचं त्याने ठरवलं.त्याला वाटेत गोवा लागलं.गोव्याच्या सौंदर्याची भुरळ त्याला पडलीच.तो तिथे काही काळासाठी थांबला.इथे त्याला एक पोर्तुगीज मुलगी भेटली.ती 'काझा द मिसेरीकॉर्डिया' या कॉन्व्हेंटमध्ये नन होती.तिला उत्तम लॅटिन येत होतं. मुख्य म्हणजे तिला मठात जोगीण बनून राहायचा कंटाळा आला होता.लॅटिन शिकता शिकवता या दोघांनी गोव्यातून पळून जाण्याचं ठरवलं.बर्टनने स्वतः ही योजना आखून यशस्वीही केली.यानंतर चार वर्षांनी त्याने त्याच्या गोव्यातील वास्तव्यावर एक पुस्तक लिहिलं.'गोवा अँड द ब्लू माउंटन्स ऑर सिक्स मंथ्स ऑफ सिक लीव्ह' हे १८५१ मध्ये प्रसिद्ध झालेल्या त्या पुस्तकाचं नाव. या पुस्तकात बर्टनने त्या पलायनाची घटना जशीच्या तशी न लिहिता ती एका अज्ञात ब्रिटिश तरुणाचं साहस म्हणून समाविष्ट केली. 


गोव्यातून कालिकतला पोहोचल्यानंतर बर्टन उटकमंडला गेला.इथे त्याला पर्शियनचा जाणकार असलेला एक मौलवी भेटला.त्याच्याकडून तो पर्शियन शिकला.सप्टेंबर १८४७ मध्ये तो मुंबईला परतला. मुंबईत त्याने पर्शियन भाषेची सरकारी परीक्षा दिली. नेहमीप्रमाणे याही भाषेच्या परीक्षेत तो पहिला आला. वैद्यकीय अधिकाऱ्याशी थोडीशी हुज्जत घालून त्याने शारीरिक सक्षमतेचं प्रमाणपत्र मिळवलं आणि तोपर्यंत अशक्तच असलेला बर्टन वैद्यकीय रजा संपवून त्याच्या सैनिकी सेवेत रुजू झाला.


सेवेत रुजू झाल्यानंतर त्याची रवानगी परत कराचीला करण्यात आली.इथे त्याने त्याच्या सिंधविषयक पुस्तकात भर घालण्यासाठी माहिती गोळा करणं सुरू केलं. इ.स. १८४८च्या उन्हाळ्याच्या थोडं आधीच दुसरं इंग्रज-शीख युद्ध सुरू झालं.बर्टनजवळ सहा भाषांमधील प्रावीण्याची प्रशस्तिपत्रकं आणि आधीच्या अधिकाऱ्यांची 'स्थानिकांमध्ये सहजपणे मिसळतो' अशी भलावण होती.त्या जोरावर त्याने पंजाबमध्ये घुसणाऱ्या सैन्याबरोबर दुभाष्या म्हणून जाण्याची परवानगी मागितली.

मात्र,त्याच्या नेहमीच्या वाह्यातपणाने त्याला पुन्हा एकदा दगा दिला. त्याला संधी नाकारण्यात आली.


त्यामुळे निराश झालेल्या बर्टनने नंतरची चार वर्षं इंग्लंड आणि फ्रान्समध्येच व्यतीत केली.या काळात त्याने वेगवेगळ्या विषयांवर पाच पुस्तकं लिहिली.याच काळात त्याला एक कल्पना सुचली.

त्याला जागतिक प्रसिद्धी मिळवून देणाऱ्या प्रवासाची ही योजना होती. इ.स. १८५२ मध्ये या योजनेला संमती मिळावी म्हणून त्याने ती वरिष्ठांपुढे मांडली.'मध्य आणि पूर्व अरबस्तानाचं भूसंशोधन' असं त्या योजनेचं स्वरूप होतं.या मोहिमेत रुब-अल्‌खाली या 'एंप्टी कार्टर' नावाने ओळखल्या जाणाऱ्या प्रचंड वाळवंटी भूभागाचाही समावेश होता.बर्टनच्या नियोजित साहसाला रॉयल जिओग्राफिक सोसायटीने मदत द्यायचं मान्य केल.

..अपुरे राहिलेला भाग पुढील लेखामध्ये..!




२४/११/२५

चक्रवर्ती / Chakraborty


गावाबाहेरच्या तळ्याच्या बाजूला एक पाच फूट…अपुरे राहिलेला भाग पुढे सुरु…


उंच देव्हारा बांधून त्यात त्या देवाची प्रतिष्ठापना केली. गावकरी लांबूनच बघत होते.हळू आवाजात चर्चा करत होते.देवाच्यानंतर नंबर होता पिंपळाचा.त्यादिवशी मात्र गाव कर्फ्यू लागल्यासारखं घरात बसून राह्यलं. कॉन्ट्रॅक्टरच्या माणसांव्यतिरिक्त फक्त चक्रवर्ती डॉक्टरदाम्पत्य हजर होतं.डॉ.पटेलांनीही येणं टाळलं होतं.पिंपळ तोडायला बारा मजूर आणि बारा तास लागले.नवीनबाबूंच्या सल्ल्याप्रमाणे कॉन्ट्रॅक्टरने तीन मोठे ट्रक आणून ठेवले होते.

त्यातूनच त्या प्रचंड वृक्षाचे अवशेष गावातून बाहेर काढले.

नवीनबाबूंना ते तोडलेलं झाड बघून त्यावर होणारी लोकांची चर्चा टाळायची होती.एवढं करूनही पुढचे पंधरा दिवस सगळा गाव त्याबद्दल दब्या आवाजात चर्चा करतच होता.


पिंपळाजवळ मजूर नि डॉक्टर दाम्पत्याशिवाय कुणीही हजर नसतानाही एक अफवा वणव्यासारखी गावभर पसरली - पिंपळावर कुऱ्हाडीचा पहिला घाव बसताच रक्ताची चिळकांडी उडाली म्हणे ! कुणी सांगत होता - कुऱ्हाडीच्या प्रत्येक घावाबरोबर कण्हण्याचा आवाज झाडातून येत होता...!


पिंपळ तोडताना उडालेला अफवांचा धुरळा हळूहळू खाली बसू लागला.चक्रवर्तीच्या बंगल्याचं काम पूर्णत्वाकडे पोहचायला लागलं.दुर्गापूजेच्या आठवडाभर आधी नवीन बंगल्यात राहायला जायचं आहे हे नवीनबाबूंनी बजावलंच होतं.एकीकडे बंगल्यातल्या आणि दवाखान्यातल्या फर्निचरचंही काम चालू होतं. बंगल्याचं काम सुरू होताच दवाखान्यासाठी लागणारी अत्याधुनिक उपकरणं मागवली गेली.आता गावकऱ्यांच्या भीतीचं आणि काळजीचं रूपांतर औत्सुक्य आणि कौतुकात झालं होतं तरीही पारावरचा तो देव नि पुरातन पिंपळ लोकांच्या मनात मधूनच डोकावत होते.शेवटी एकदाचं बंगल्याचं काम संपलं.


दवाखान्याचं उ‌द्घाटन डॉ.पटेल ह्यांच्याच हस्ते नवीनबाबूंनी केलं आणि दवाखाना सुरू केला. दवाखान्यात पहिल्यासारखी गर्दी होऊ लागली.इतका चकाचक दवाखाना,मुंबईहून आणलेली भारी मशिनरी... त्यामुळे डॉक्टरांचे धर्मादाय दवाखान्यासारखे मोफत उपचार तर सोडाच पण फी भरपूर असणार,बहुदा ती आपल्याला परवडणारी नसेल असा बहुतेकांचा समज झाला.पण दवाखान्यात गेल्यावर त्यांना धक्काच बसला ! पेशंटना बसण्यासाठी असलेल्या जागेत एका कोपऱ्यात एक लाकडी बॉक्स ठेवलेला होता.त्यावर ना दोन्ही डॉक्टरांची नजर होती ना दवाखान्यातल्या कर्मचाऱ्यांची.त्या बॉक्सवर पाटी लावली होती -


तुम्हाला परवडत असेल तरच आणि तेवढीच फी ह्या बॉक्समध्ये टाकावी.


सगळ्यांनीच ह्या उपक्रमाचं स्वागत केलं.नवलाची गोष्ट म्हणजे वेटिंगरूममध्ये बसलेले इतर पेशंट्स बाहेर जाणारी व्यक्ती त्या पेटीत पैसे टाकते की नाही ह्यावर लक्ष ठेवायचे.

काही चिकित्सक मंडळी तर कोण किती पैसे टाकतं हयावरही लक्ष ठेवायची.


दवाखाना नवीन जागेत सुरू झाल्यावर पहिल्या आठवड्यातच एका अडलेल्या बाळंतिणीची केस आली. तोपर्यंत आजूबाजूच्या गावातही सुईणीच बाळंतपण करायच्या.त्या आपल्या कामात पारंगत असत. त्यातल्या त्यात सावित्रीबाई तर फारच हुशार होत्या. त्यांच्याविषयीची एक गोष्ट लोक आवर्जून सांगतात -


एकदा सावित्रीबाई एका प्रतिष्ठित घरातल्या सुनेच्या बाळंतपणासाठी गेल्या होत्या.बाळाची जन्मवेळ जवळ यायला लागली आणि बाळ पायाळू जन्मणार अशी चिन्हं दिसायला लागली.कुटुंबप्रमुख स्त्री काळजीत पडली.

सावित्रीबाईंनी एक उदबत्ती मागवली आणि नवजाताच्या अस्पष्ट दिसणाऱ्या पायाच्या अंगठ्याला ती जळती उदबत्ती निमिषमात्र टेकवली.गर्भाशयातल्या बाळाने पटकन् पाय आत ओढून घेतला आणि ते गर्रकन् पोटातल्या पोटात फिरलं.बाळ पायाळू न होता कुटुंबाला हवं तसं नॉर्मल जन्मलं.चिंतेचं कारण उरलं नाही !


तर अशा ह्या कुशल सावित्रीबाईंनीही त्या अडलेल्या बाळंतिणीच्या केसपुढे हात टेकले होते.अशा अवस्थेत जिल्हयाच्या दवाखान्यात नेणंही अशक्य होतं.त्या काळात तिथेही सिझेरियनच्या केसेस दुर्मिळ होत्या आणि गावात तर अशी एकही केस झाली नव्हती. अशावेळी त्या चिंताग्रस्त कुटुंबाला डॉ.शामलींची आठवण झाली.ते ताबडतोब त्या अडलेल्या बाळंतिणीला घेऊन डॉ.

शामलींच्या दवाखान्यात आले. अमेरिकेत शिकलेल्या आणि प्रॅक्टिस केलेल्या डॉ. शामलींसाठी ही केस अगदीच किरकोळ होती. बाळंतिणीची सुखरूप सुटका झाली.बाळंतिणीच्या कुटुंबाला इतका आनंद झाला आणि त्यांना इतकी कृतज्ञता वाटली की,ते अख्खं कुटुंब डॉ.शामलींच्या पाया पडायला लागलं.त्यांच्या कुटुंबप्रमुखाने फी विचारली तर डॉ.शामलींनी कोपऱ्यात ठेवलेल्या त्या बॉक्सकडे बोट दाखवलं.


ह्या केसनंतर डॉ.शामलींच्या कौतुकाच्या वर्षावात लोकांच्या मनातली पिंपळाची ती उरलीसुरली सावलीही नाहीशी झाली.खेड्यापाड्याच्या अडाणी बायका तर 'डागतरीन बाईला देवाचं वरदान आहे' असं मानायला लागल्या.

एकमेकींशी बोलताना त्या असा उल्लेख करून म्हणत,


"बय गं,आक्रीतच झालं ! बाईचं पोट फाडून पोर बाहेर काढलं अन् पोट परत शिवून बी टाकलं..."


ह्या प्रसंगानंतर गावातल्या तरुणींची तर डॉ.शामली नायिकाच झाल्या.अनेक बाबतींत त्यांचं अनुकरण होऊ लागलं.भांगात कुंकू भरण्याची फॅशन गावच्या विवाहित स्त्रियांमध्ये आली.कळस म्हणजे भडक लाल,हिरव्या, भगव्या रंगाच्या बॉर्डर असलेल्या पांढऱ्या आणि मोतीया रंगाच्या रेशमी साड्या एका हुशार दुकानदाराने 'शामली साडी' अशी जाहिरात करून विकायला सुरुवात केली !


एकंदरीत नवीनबाबू,शामली हे डॉक्टरद्वय ह्या लहानशा गावात रमले.रुळले.स्वतःकडे पाहायला आता त्यांना वेळ मिळू लागला होता.लोकांना विश्वासात घेऊन दवाखाना शनिवारी अर्धावेळच उघडा ठेवायला त्यांनी सुरुवात केली.गावाच्या बाहेर मामलेदार कचेरीनंतर आणि कोर्टाच्या आधी एक क्लब होता.नवीनबाबू आणि अर्थातच शामलीदेखील क्लबच्या सभासद होऊन दर रविवारी सकाळी क्लबमध्ये टेनिस खेळायला जाऊ लागले.एकदा शनिवारी संध्याकाळी नवीनबाबू आणि शामली एसटी स्टँडला लागून असलेल्या रस्त्यावरून पुढे गावाबाहेर पायीपायी फिरायला चालले होते. रस्त्यावरून पुढे गावाबाहेर साधारण तीनेक फर्लांग गेल्यावर एक छोटासा गाडी रस्ता पुढे गेलेला त्यांना दिसला.तो पुढे कुठे तरी धानोरे नावाच्या गावाकडे जात होता म्हणे.दोन्ही रस्त्यांच्या तिठ्यावर एक अर्धवट बांधकाम दिसलं.पूर्ण झालेला जो भाग दिसत होता तो उत्कृष्ट होता.डॉ.शामली म्हणाल्या,"आपलं आत्ताचं घर भरवस्तीत आहे.दवाखान्याच्या जागेसाठी नक्कीच सोयीचं आहे.पण राहायला अशी एखादी रमणीय जागा हवी.ह्या जागेचा आकार थोडा विचित्र आहे.एकूण जागा त्रिकोणी आहे." ह्या जागेसंबंधीही हे डॉक्टरद्वय डॉ.पटेलांशी बोललं. पुढचा भाग साठ फुटापर्यंत आणि तो निमूळता होत शेपटासारख्या टोकाला जेमतेम दोन फूट झाला होता. अशा जागेला व्याघ्रमुखी जागा म्हणतात आणि ती राहायला अशुभ मानली जाते.असं डॉ.पटेलांनी त्यांना सांगितलं.ह्यावेळीसुद्धा दोघांनाही ती जागा आवडल्यामुळे ती त्यांनी घ्यायचं ठरवलं आणि आपल्या हौसेप्रमाणे बांधकाम पूर्ण करायला सुरुवात केली. ह्यावेळी 'जागा घेऊ नका' असा सल्ला मात्र गावातल्या कुणीच दिला नाही.


आता गावात येऊन डॉ.चक्रवर्तीद्वयांना एक वर्षं झालं होतं.ते त्यांच्या स्वतःच्या घरात राहयला गेले तेव्हा दुर्गापूजा जवळ आली होती.आता पुन्हा एकदा दुर्गापूजा आली.ही पूजा दणक्यात करायची असं ठरलं.दोघेही तयारीला लागले.बंगाली मिठाया बनवण्यासाठी बाहेरून आचारी बोलावले.सगळ्या बंगल्याला दीपमाळांनी सजवलं. गावातल्या काही खास जवळच्या लोकांना त्यांनी जेवायला बोलावलं.अगदी काटूनकुटून निमंत्रणं केली तरीही दीडशे माणसं झाली होती.इतर लोक संध्याकाळी प्रसादाला आणि नास्त्याला आले होते.


कार्यक्रम खूप धूमधडाक्यात झाला.नवीनबाबू पांढरा कुर्ता आणि बंगाली पद्धतीचं धोतर नेसून सोगा खांद्यावर टाकून लोकांचं आगत-स्वागत करत होते. लांब,काळेभोर केस मोकळे सोडलेल्या,

पांढऱ्या रेशमी साडीतल्या डॉ.शामली स्वतःच दुर्गा वाटत होत्या.डॉ. शामली विजेसारखी हालचाल करत सर्वत्र वावरत होत्या.बायाबापड्यांनी मनातल्या मनात हजारवेळा त्या दोघांची दृष्टी काढली.डॉक्टर पटेलांच्या पत्नीने तर शामलींना काजळाची लहानशी तीटसुद्धा लावली आणि अशीच तीट शामलींनी नवीनबाबूंना लावावी असंही सुचवलं.नवीनबाबू जरा थकलेले पाहून शामलींनी त्यांना विचारलं तेव्हा 'काही विशेष नाही' म्हणत त्यांनी शामलींचं बोलणं उडवून लावलं.आणखी तासाभराने मात्र ते शामलींना म्हणाले,"मी जरा वरती जाऊन पडतो. थोडीशी चक्कर आल्यासारखं वाटतंय.तू पाहुण्यांकडे बघ." डॉ.शामलींनी त्यांचं ब्लडप्रेशर बघितलं.ते अगदी व्यवस्थित होतं.त्यामुळे शामली खाली आल्या आणि पाहुण्यांमध्ये मिसळून गेल्या.


सगळ्यांचं हवं-नको बघून नंतर सर्वांना निरोप देऊन डॉ. शामली वर बेडरूममध्ये गेल्या तेव्हा नवीनबाबू तापाने फणफणलेले दिसले.अर्धवट झोपेत ते अधूनमधून कण्हत होते.डॉ.शामलींनी त्यांना पॅरासिटामॉल दिली. पांघरूण घालता घालता त्या म्हणाल्या,


"नवीन,तुझी खूपच धावपळ झालीय.श्रमाने ताप आलेला दिसतोय.उद्याचा दिवस आराम कर.खाली दवाखान्यातदेखील येऊ नकोस.तुझे पेशंट मी बघेन."


डॉ.नवीन ह्यांनी मान डोलवली आणि परत त्यांना ग्लानी आली.

डॉ.शामलीही थकून गेल्या होत्या.नवीनची झोपमोड होऊ नये म्हणून त्यांनी शेजारच्या बेडरूममध्ये जाऊन अंग टाकलं पण त्यांना झोप काही येईना डॉ. नवीन ह्यांना त्या लग्नाच्या आधीपासून ओळखत होत्या. दोघेही कलकत्त्यात शेजारीच राहत होते.आजपर्यंत डॉ. शामलींनी नवीनना आजारी पडलेलं पाहिलं नव्हतं. नियमित भरपूर व्यायाम करणाऱ्या दणदणीत प्रकृतीच्या नवीनना कधी साधा तापदेखील आलेला शामलींना आठवत नव्हता.रात्री मध्येच त्या नवीनच्या बेडरूमध्ये गेल्या.त्यांच्या कपाळाला हात लावून पाहिला तर त्यांचं संपूर्ण अंग घामाने डबडबलेलं होतं.हलकेच त्यांचा घाम टिपून त्यांना थोपटून शामली झोपायला गेल्या.दुसऱ्या दिवशी सकाळी नवीनचा ताप उतरला.

त्यांना फ्रेशपण वाटत होतं.पण शामलींनी त्यांना आराम करायला लावला.दोन दिवसांनंतर डॉ.नवीन ह्यांनी परत त्यांच्या नियमित आयुष्याला सुरुवात केली.पण साधारण आठवडाभराने त्यांना गळून गेल्यासारखं वाटलं म्हणून संध्याकाळचे त्यांचे पेशंट्स डॉ.शामलींनी तपासले.ह्या वेळेला नवीनना अधूनमधून चक्करही येत होती.दोन दिवस ते अंथरुणावरच होते.आता मात्र डॉ. शामलींना काळजी वाटू लागली.त्यांनी डॉ.पटेलांशी चर्चा केली आणि नवीनच्या सगळ्या टेस्ट्स केल्या. सगळ्या नॉर्मल आल्या पण नवीनचा बारीक ताप आणि थकवा काही कमी होत नव्हता.


हळूहळू नवीनचं वजन कमी होऊ लागलं.डोळ्यांभोवती काळी वर्तुळं दिसू लागली.शामली नवीनना घेऊन डॉ. पटेल ह्यांच्या सोबतीने मुंबईच्या प्रख्यात डॉक्टरांकडे गेल्या.पुन्हा सगळ्या टेस्ट्स झाल्या पण निदान काही झालं नाही.बारीक ताप असे पण थोडासाच.थकवा येतच होता.गावाबाहेरचा बंगला तयार झाला होता पण तो बघायला जायचा उत्साह शामलींना नव्हता.थोडा बदल व्हावा म्हणून त्यांनी नवीनबाबूंना आग्रह करून क्लबमध्ये नेलं.पण नवीनबाबूंना चक्कर येऊ लागली म्हणून पाच मिनिटांतच ते तिथून निघाले.आता गावकऱ्यांमध्येही डॉक्टरसाहेबांच्या प्रकृतीच्या चिंतेचं सावट पसरलं.ह्या देखण्या जोडप्याला कुणाची तरी दृष्ट लागली असंही त्यांना वाटू लागलं.


एक दिवस अचानक नवीनबाबू शामलीला म्हणाले,"आपण नवीन बंगल्यात राहायला जाऊ.गावाबाहेरच्या मोकळ्या हवेत कदाचित मला लवकर बरं वाटेल."


डॉ.पटेल ह्यांच्या कुटुंबीयांच्या मदतीने शामलींनी आवश्यक सामानासह नवीन बंगल्यात बस्तान हलवलं. दोन दिवस बरे गेले.पण नंतर परत पहिले पाढे पंचावन्न. सुरुवातीचे काही दिवस शामली तिथूनच दवाखान्यात येत-जात होत्या.पण त्यांची फारच धावपळ होऊ लागली होती.त्यामुळे डॉ.पटेलांना त्यांनी दवाखाना सांभाळण्याची विनंती केली आणि स्वतः नवीनबाबूंची सेवा करायला त्यांच्याबरोबर जास्तीत जास्त वेळ राहू लागल्या.

नवीनबाबू आता फारच खंगले होते.त्यांचे कपडे त्यांना ढगळ होऊ लागले होते.एक एक पाऊल टाकणं जड जात होतं.घरातल्या घरात ते व्हील चेअरवर फिरत.डॉ.शामली त्यांना सकाळी -संध्याकाळी बंगल्याच्या बागेत फिरवत असत.आपल्या डॉक्टरांना असं व्हील चेअरवर बघून बंगल्याजवळच्या रस्त्यावरून फिरायला जाणाऱ्या लोकांना फार वाईट वाटे.


एक दिवस डॉ.पटेलांना 'ताबडतोब या' असा डॉ. शामलींचा निरोप गेला.नवीनबाबूंना रक्ताची मोठी उलटी झाली होती आणि ते कोमात गेले होते.आठ दिवस ते कोमातच होते.गावातल्या प्रत्येकाने त्यांच्यासाठी देवाकडे प्रार्थना केली.काहींनी मृत्युंजयाचे पाठ सुरू केले.शंकराला अभिषेक तर सतत चालूच होता.पण अखेर नवव्या दिवशी नवीनबाबूंची जीवनयात्रा संपली. गावातल्या एकाही घरात त्या दिवशी चूल पेटली नाही. गावाने एवढी मोठी अंत्ययात्रा पहिल्यांदाच पाहिली.हे सगळं होत असताना डॉ.शामली दगडी चेहऱ्याने शांत होत्या.त्यांच्या डोळ्यांतून एकही टिपूस निघाला नव्हता. त्यांच्या सगळ्या संवेदना जणू गोठून गेल्या होत्या.


आठ दिवस झाले.गाव अजून त्या धक्क्यातून सावरलं नव्हतं तोच त्याला आणखी एक धक्का बसला.डॉ. शामलींनी परत अमेरिकेला जाण्याचा निर्णय घेतला होता.डॉ.पटेलांना आणि त्यांच्या पत्नीला त्यांनी मुंबईपर्यंत येण्याची विनंती केली होती.गावातल्या प्रतिष्ठित मंडळींनी एक सभा घेतली.त्या सभेत ठरल्याप्रमाणे चारपाच पुरुष त्यांच्या कुटुंबीयांसह गावाबाहेरच्या बंगल्यात डॉ.शामलींना भेटायला गेले. त्यांनी डॉ.शामलींनी अमेरिकेला परत जाऊ नये म्हणून गावाच्या वतीने विनंती केली.त्यातल्या एका पोक्त स्त्रीने डॉ.शामलींना आपल्या कुशीत घेतलं.त्यांच्या तोंडावरून हात फिरवत ती म्हणाली,


"बयो,तू गावातच राहा गं.माहेरवाशिणीसारखी आम्ही तुझ्यावर माया करू. तझी काळजी घेऊ..."


आता मात्र शामलींच्या भावनांचा बांध फुटला.उर फुटल्यागत त्या रडू लागल्या.त्यांचं आतापर्यंत बाहेर न फुटलेलं रडू बाहेर येणं आवश्यक होतं,हे सगळ्यांना समजत होतं.त्यामुळे कुणीही त्यांची समजूत न घालता त्यांना मनसोक्त रडू दिलं.रडण्याचा भर ओसरल्यावर स्वतःला सावरत पण शून्यात बघत डॉ.शामली म्हणाल्या, "आता माझा इथला शेअर संपला.इथल्या प्रत्येक गोष्टीत माझी आणि नवीनची स्वप्नं गोठलेली आहेत. मी आता इथे राहणं अशक्य आहे.आमचा प्रांत वेगळा,देश वेगळा.भाषाही वेगळी.तरीही तुम्ही सगळ्यांनी आम्हाला जे प्रेम दिलं त्याची आठवण बरोबर घेऊन मी जात आहे."


शामलींना मुंबईपर्यंत सोडून डॉ.पटेल परत आले. शामलींच्या दोन्ही घरांच्या आणि दवाखान्याच्या चाव्या आता त्यांच्याकडे होत्या.त्याचं त्यांनी काय करायचं ह्याचा निर्णयही शामलींनी त्यांच्यावरच सोपवला होता.डॉ.पटेलांनी गावाबाहेरचा बंगला आवरला. बाजारपेठेतलं घर आवरलं.ते बंद करण्यापूर्वी सगळीकडे एकदा त्यांनी फेरी मारून बघावं म्हणून दवाखान्याच्या मागच्या दरवाजातून ते परसात आले तर काय आश्चर्य !


मध्यभागी पिंपळाचं एक छोटंसं रोप तरारून वर आलं होतं.त्याची दोन छोटी पानं विजयी मल्लाने फड जिंकल्यानंतर हवेत बाहू पसरून आनंद व्यक्त करावा तशी दिमाखाने हवेत डुलत होती.


२२/११/२५

चक्रवर्ती / Chakraborty

मला आठवतंय तेव्हापासून गावात पाण्याची रडच आहे. गावातले लोक गमतीने पाहुण्यांना म्हणत,


" जेवायला आमच्याकडे या पण हात धुवायला शेजारच्या गावात जा." पूर्वीच्या काळी मुलांची लग्नं व्हायलासुद्धा ह्याच कारणाने अडचण व्हायची.मुलीकडचे म्हणायचे, 'नको रे बाबा ह्या गावात लेक द्यायला!पाणी भरून भरूनच मरून जायची पोर.'


बाकी गाव मात्र दुमदार होतं.तालुक्याचं ठिकाण होतं. हवा चांगली होती.मात्र गावात पाणी नसल्याने गावाची वाढ खुंटली होती.असं म्हणतात की,ज्याची लोकसंख्या कमी होत चाललीय असं हे एक अपवादात्मक गाव आहे.गावात नोकऱ्या नसल्याने होतकरू मुलं शिक्षण झालं की,बाहेरगावी नोकरीच्या शोधात गाव सोडून जात होती.गावात फक्त छोटेमोठे व्यावसायिक आणि दुकानदार प्रामुख्याने राहत होते.त्यामुळे गावगप्पांना सगळ्यांकडे भरपूर वेळ होता.गावातल्या पारावर, दुकानांत,नाक्यानाक्यावर गप्पांचे अड्डे जमवलेले लोक दिसत.एखादी बातमी सगळ्या गावात वाऱ्यासारखी पसरे आणि त्याचं चर्वितचर्वण गावभर चाले.


( गावगोत - माधव सावरगांकर -अष्टगंध प्रकाशन )


एकदा अशीच एक बातमी गावभर चर्चेचा विषय झाली. गावातल्या पटेल डॉक्टरांचा मुलगा प्रशांत अमेरिकेत शिकत होता.त्याचा एक बंगाली मित्र आणि त्याची बायको गावात राह्यला येणार आहेत,ही ती बातमी ! बातमीला दुजोरा मिळू लागला.प्रशांतच्या मित्राने आणि त्याच्या बायकोने डॉक्टरीचं शिक्षण अमेरिकेत घेतलं होतं.

तिथेच काही वर्षं प्रॅक्टिसही केली होती.आता त्यांना भारताच्या एखाद्या छोट्या गावात येऊन इथे प्रॅक्टिस करायची होती म्हणे.

प्रशांतकडून त्यांनी त्याच्या गावाची माहिती ऐकली आणि कुठे तरी जायचं तर ह्या गावातच जाऊ या,निदान इथे प्रशांतचे कुटुंबीय तरी आहेत.त्याचे वडीलपण ह्याच व्यवसायात आहेत. अडीअडचणीला त्यांची मदत होऊ शकेल.काही वर्षं एक नवीन अनुभव घेऊ या.

नाही जमलं तर परत अमेरिकेत येऊ.ह्या विचाराने त्यांनी इथे येण्याचा निर्णय पक्का केला.सगळ्या गावात आता दुसरा विषयच नव्हता.अमेरिकेतला डॉक्टर गावात येणार म्हणजे उठसूट उपचारासाठी जिल्ह्याच्या गावी पळायला नको. 


गावात एकही डॉक्टरीण नव्हती.बाळंतपण सुईणी करायच्या.ही नवीन डॉक्टरीण आली म्हणजे बायकांचीसुद्धा आता मोठी सोय होणार होती.मग कुणीतरी म्हणालं,"नवीन डॉक्टरचं नाव चक्रवर्ती आहे म्हणे.म्हणजे राजघराण्याशी संबंध दिसतोय !"गावात बहुतांशी मराठी वस्ती होती.व्यापारीवर्गातले मारवाडी, गुजराती कुटुंबंही मराठीच बोलत.गावातली मुसलमान मंडळीदेखील 'म्हमद्या भागके भागके जाऊन वट्यावर चढ' अशाच पद्धतीचं,हिंदीला नुस्तं स्पर्श करणारं मराठी बोलत.त्यामुळे चक्रवर्ती आडनाव ह्यापूर्वी कधी कुणी ऐकलं नव्हतं.त्यामुळे डॉक्टरकुटुंब राजघराण्याशी संबंधित असावं असं सगळेजण ठामपणे सांगू लागले.गावाला ऐतिहासिक पार्श्वभूमी होती. 


पेशव्यांचे सरदार विंचुरकर ह्यांनी गाव वसवलं होतं म्हणून गावात वाडे,गढ्या ह्यांची कमतरता नव्हती. बरेचसे वाडे आता मोडकळीस आले होते.पण प्रत्येकाच्या कहाण्या आणि आख्यायिका होत्या.

अशा वाड्यांमध्ये बळदं,भुयारंसुद्धा भरपूर होती.त्यामुळे आख्यायिकांना पोषक असं वातावरण होतं.


अमेरिकन पाहुणे मात्र डॉक्टर पटेलांच्याच शेजारी असलेल्या एका टुमदार घरात सुरुवातीचे काही दिवस राहणार होते आणि प्रशांतचे वडील ज्या धर्मादाय दवाखान्यात प्रॅक्टिस करायचे तिथूनच सुरुवात करणार होते.डॉ.शांतिलाल पटेल ह्यांनी त्या उभयतांसाठी दवाखान्यात दोन नवीन केबिन्सदेखील बांधून घेतल्या. गावातला प्रत्येक जण त्या बघूनही आला.आता फक्त चक्रवर्ती दाम्पत्य येण्याचीच वाट होती.


त्यांच्या येण्याचा दिवस ठरला आणि डॉ.शांतिलाल पटेल मुंबईला पाव्हण्यांना आणायला गेले.गावकऱ्यांची उत्सुकता शिगेला पोहचली होती.धर्मादाय दवाखान्याच्या केबिन्सवर डॉ. एन. सी. चक्रवर्ती आणि डॉ.शामली चक्रवर्ती ह्या नावांच्या पाट्या लागल्या आणि लोकांच्या कल्पनाशक्तीला ऊत आला. डॉक्टरांचं नाव न वरून म्हणजे नीतीन,नवीन वगैरे असणार.वडिलांचं नाव चिंतामणी,चंद्रकांत वगैरे असावं, असाही तर्क केला गेला.पण नंतर पटेल कुटुंबीयांकडून समजलं की,बंगाली पद्धतीप्रमाणे वडिलांचं नाव देण्याऐवजी दोन्ही आद्याक्षरं डॉक्टरांच्या स्वतःच्याच नावाची होती.डॉक्टरांचं नाव होतं सवीनचंद्र,लोकांना सगळंच नवीन होतं.आता फक्त त्या दोघांना पाहण्याचीच वाट होती.येणार येणार म्हणून गाजत असलेल्या डॉक्टर दाम्पत्याला घेऊन डॉ.शांतिलाल पटेलांची गाडी आली.घराघरांच्या खिडक्यांतून, सज्जांतून अनेक उत्सुक डोळे त्यांना पाहत होते.गाडी थांबली.डॉक्टरदाम्पत्य गाडीतून खाली उतरलं. नवीनचंद्र हे चांगले उंचेपुरे,नाकीडोळी नीटस असलेले होते.दंडाशी घट्ट असलेल्या टी शर्टच्या बाह्यांतून त्यांचे कमावलेले दंड नजरेत भरत होते.त्यांनी केस उलटे वळवलेले होते.त्यातून एक चुकार बट सारखी कपाळावर येत होती आणि ती मागे करण्याची त्यांची लकब आकर्षक होती.दिसण्यामध्ये शामली निर्विवाद भाव खाऊन जाईल अशी होती.नावाप्रमाणे सावळी असली तरी तिचे डोळे लक्षात येण्याइतके तेजस्वी होते. तिच्या धारदार नाकाला चाफेकळीचीच उपमा योग्य ठरली असती.डॉ.पटेलांशी बोलताना ती एकदा हसली आणि तिचे पांढरे स्वच्छ दात बघितल्यावर ती एकूणच सुंदर आहे असं सगळ्यांचं मत झालं.पांढरीशुभ्र रेशमी साडी तिच्या सावळ्या रंगाला शोभून दिसत होती. कपाळावरचं अन् भांगातलं लालभडक कुंकू तिच्या सौंदर्यात भरच टाकत होतं.


चक्रवर्ती दाम्पत्याने आजूबाजूला पाहिलं आणि लोक आपल्याला बघण्यासाठीच आले आहेत,हे त्यांच्या लक्षात येताच त्या दोघांनीही हात जोडून हसतमुखाने चारी बाजूंना बघत वंदन केलं.त्यासरशी त्यांनी पहिल्या दर्शनातच तिथे असलेल्या लोकांना पर्यायाने सगळ्या गावाला जिंकलं.ते दोघे घरात शिरले आणि त्यांना बघायला उभी असलेली मंडळी आपापल्या अड्ड्यांवर त्यांच्याविषयीची माहिती द्यायला रवाना झाली.प्रत्यक्ष न बघताही थोड्याच अवधीत सगळ्या गावाचं चक्रवर्ती दाम्पत्याबद्दल अतिशय चांगलं मत झालं.


संध्याकाळी त्यांच्या सामानाचा ट्रक आला.दोन दिवस चक्रवर्ती जोडी पटेल कुटुंबातील नोकरांच्या मदतीने सामान लावत होती.

किरकोळ मदतीसाठी सुतार आणि इलेक्ट्रिशियन बोलावले होते.शामलीच्या बरोबरीने नवीनबाबूंना घरकामात मदत करताना बघून त्यांना आश्चर्यच वाटलं.गावात घरकामात बायकांना इतकी मदत करणारा पुरुष त्यांनी पाहिलाच नव्हता.


दोन दिवसांनंतर नवीनबाबू आणि शामलीमॅडमनी दवाखान्यात यायला सुरुवात केली.एकदोन दिवसांतच ह्या धर्मादाय दवाखान्याचं जणू नशीबच पालटलं. वाढती गर्दी पाहून डॉ.पटेल चकितच झाले.इंग्रजी टोन असलेले दोघेही डॉ.चक्रवर्ती बंगाली मिश्रित हिंदी बोलण्याचा प्रयत्न करत होते.लोकांना तर त्याचंही कौतुकच वाटत होतं.तेही मोडक्यातोडक्या हिंदीत त्यांच्याशी संवाद साधत होते.डॉक्टर माधवला 'माधब' कसं म्हणतात आणि उस्मानपुऱ्यातल्या गनीला 'गोनी' कसं म्हणतात अशा बारीकसारीक गोष्टींची चर्चा गावात कौतुकाने होऊ लागली.दोन्ही डॉक्टरांची स्मरणशक्ती तल्लख होती.एकदा भेटलेल्या व्यक्तीचं नाव त्यांना बिनचूक आठवत असे.थोड्या चुकीच्या पद्धतीने का होईना पण आपलं नाव लक्षात ठेवून डॉक्टरांनी उच्चारलं ह्याचं अप्रूप लोकांना वाटू लागलं.


दिवसागणिक दवाखान्यातली गर्दी वाढू लागली. दोघांच्याही हाताला चांगला गुण आहे असं सार्वत्रिकरीत्या मत तयार झालं.

सकाळी साडेनवाला दवाखाना उघडायचा.लोक त्याच्या आधीपासून रांग लावून बसलेले असत.दुपारी एकपर्यंत पेशंटना तपासणं अव्याहत चाले.बरोबर एक वाजता दवाखाना बंद व्हायचा तो साडेपाचला परत चालू होई.डॉक्टर दाम्पत्याच्या हातगुणाची आणि नियमितपणाची ख्याती पंचक्रोशीत पसरली.त्यामुळे कुठून कुठून रोगी त्यांच्याकडे उपचारासाठी येऊ लागले.रात्री नऊपर्यंत दवाखाना चालू असायचा.रविवारी मात्र पूर्ण दिवस बंद. एका महिन्यानंतर नवीनचंद्रांनी डॉक्टर पटेल ह्यांच्याकडे स्वतःचा दवाखाना सुरू करण्याविषयी आणि राहण्याच्या जागेसंबंधी चर्चा केली.डॉ..पटेलांनी त्यांना म्हटलं,"वेगळा दवाखाना सुरू करण्याची गरज आहे काय ? इथेही व्यवस्थित चाललं आहे ना."पण नवीनचंद्रांचे विचार स्पष्ट होते.त्यांनी म्हटलं, "डॉक्टरी क्षेत्रात खूप नवीन मशिन्स आली आहेत. त्यामुळे रोगाचं निदान करायला मदत होते.अर्थात त्यासाठी मोठ्या गुंतवणुकीची गरज असते.इथे धर्मादाय दवाखान्यात इतक्या मोठ्या गुंतवणुकीला विश्वस्त मंजुरी देणार नाहीत.त्यामुळे आम्ही स्वतःचा दवाखाना सुरू केला तर अशी मशिन्स आम्हाला घेता येतील आणि पेशंट्सची सेवा उत्तमप्रकारे करता येईल."


डॉ.पटेलांना नवीनबाबूंचं म्हणणं रास्त वाटलं.मग दर रविवारी डॉक्टरांच्या दवाखान्यासाठी जागेचा शोध सुरू झाला.खाली तळमजल्यावर प्रशस्त दवाखाना आणि वरच्या मजल्यावर राहण्यासाठी मोठं घर अशी ढोबळ कल्पना नवीनबाबूंच्या मनात होती.अशी जागा काही मिळेना तेव्हा एखाद्या मोकळ्या जागेवर नवीन बांधकाम करावं असा विचार करून त्या दृष्टीने जागेचा शोध सुरू झाला.शामलीमॅडमना वाटत होतं,जागा अशी असावी की,ती सर्व वयाच्या पेशंट्सना यायला सोयीस्कर असली पाहिजे,त्यामुळे ती गावापासून दूर असू नये.पण गावात अशी मोकळी जागा डॉक्टरांच्या नजरेसमोर येत नव्हती.


एका रविवारी चक्रवर्ती दाम्पत्य घराबाहेर पडलं.मुख्य रस्त्यावरून चालत असताना एका ओसाड घराकडे त्यांचं लक्ष गेलं.ते घर बहुधा बरीच वर्षं बंद असावं. दारावरच्या कड्या-कोयंडेच काय,

कुलूपदेखील गंजून गेलं होतं.भिंतीही ढासळायला लागल्या होत्या.दोघांनी थांबून त्या घराविषयी विचारपूस करायचं ठरवलं. समोरच स्टोव्ह,गॅसबत्त्या दुरुस्तीचं दुकान होतं. दुकानावर ठळक अक्षरात दुकानाच्या नावाची पाटी होती - येथे वेळेवर काम होणार नाही.


अमेरिकेत असताना प्रशांतने आपल्या गावातल्या गमतीजमती सांगताना ह्या दुकानाबद्दल आणि त्याच्या विक्षिप्त नावाबद्दल सांगितलं होतं.ते आता आठवून दोघंही हसले.दुकानात एक तरतरीत तरुण बसला होता. त्याच्याकडे चौकशी केल्यावर ते घर विकायला त्याचा मालक उत्सुक आहे पण गिऱ्हाईक मिळत नाही म्हणून गेली कित्येक वर्षं ते घर तसंच पडून असल्याचं कळलं. ती जागा आतून पाहण्याची दोघांनाही इच्छा झाली.तो तरुणही त्यांना मदत करायला उत्सुक होताच.त्याने तत्परतेने म्हटलं,


"तुम्ही म्हणत असाल तर आत्ता जागा दाखवतो.ते कुलूप काय,नुस्तं शोभेचं आहे.खाली खेचलं तरी उघडेल!"


बोलता बोलता तो दुकानाबाहेर आला.त्या पडक्या घराच्या दाराचं कुलूप त्याने झटक्यात खाली खेचलं आणि खरंच,तो म्हणाला त्याप्रमाणे ते उघडलंही.त्या तरुणापाठोपाठ दोघेही आत शिरले.

एखाद्या भयपटात दाखवतात तसं दृश्य त्यांना समोर दिसलं.


दरवाजा उघडल्याबरोबर दोनचार पारवे फडफड करत बाहेर उडत गेले.वटवाघळांची जोडी दिसली त्यावरून त्यांचाही मुक्काम इथेच आहे,हे लक्षात आलं.घरभर धुळीचे थरच थर होते.जागोजागी कोळिष्टकांच्या जाळ्यांनी घराचा प्रत्येक कोपरा व्यापला होता.घर बंद अवस्थेत असल्यामुळे एक प्रकारचा कुबट वास जीव गुदमरून टाकत होता.खिळखिळ्या झालेल्या खिडक्या त्या तरुणाने उघडल्या.ट्रॅक पँट नि टी शर्ट घातलेल्या नवीनबाबूंना अशा घाणेरड्या जागेत वावरताना विशेष त्रास होत नव्हता.आपल्या ट्रेड मार्क पांढऱ्या स्वच्छ रेशमी साडीसकट शामलीमॅडमही सहजपणे तिथे वावरत होत्या.घर चांगलंच प्रशस्त होतं.मागचं दार उघडून परसदारात आलं तर तिथे एक प्रचंड प्राचीन पिंपळवृक्ष दिसला.

त्याला कधीकाळी बांधलेला पार अजूनही व्यवस्थित होता.पारावर झाडाला टेकून शेंदूर लावलेला एक दगड ठेवलेला होता.त्या दगडावर वाहिलेल्या हळद-कुंकवाचं अस्तित्व इतक्या वर्षांनंतरही जाणवत होतं.परसू तसं प्रशस्त होतं.पिंपळाच्या पारामागेही दहाएक फूट जागा मोकळी होती.नवीनबाबू आणि शामली दोघंही जागा बघून खूश झाले."हे घर पाडून मोकळ्या जागेत आपण ठरवल्याप्रमाणे अद्ययावत् दवाखाना आणि प्रशस्त घर बांधून होईल." नवीनबाबूंनी शामलीला म्हटलं.


"हो,पण ह्या झाडाचं काय?" शामलीने शंका काढली.


"झाडाचं काय म्हणजे ? ते तोडावंच लागेल." नवीनबाबूंनी उत्तर दिलं.नवीनबाबूंचं उत्तर ऐकून सोबत आलेला तो तरुण दचकून म्हणाला, "डॉक्टरसाहेब,पिंपळाचं झाड कुणी तोडत नाहीत.पाप लागतं !" "हे पाहा,ह्या असल्या गोष्टींवर माझा अजिबात विश्वास नाही आणि तुम्ही म्हणता - तसं पाप आम्हाला अजिबात लागणार नाही.कारण ह्या ठिकाणी लोकांना बरं करण्याचं नेक काम आम्ही करणार आहोत.बरं,ते जाऊ दे.ह्या घराचे मालक कोण आहेत नि ते कुठे राहतात ?" "ह्या घराचे मालक असलेले नवरा-बायको दोघंही हयात नाहीत.त्यांना मूलबाळ झालं नाही.त्यांचे दूरचे नातेवाईक आहेत पण ते जिल्ह्याच्या ठिकाणी राहतात. कडे कुणी फिरकत नाही." चक्रवर्तीदाम्पत्य घरी आलं.डॉ.पटेलांच्या कानावर त्या घरासंबंधीची माहिती घातली तेव्हा त्यांनीही थोडंफार त्या तरुणासारखंच मत व्यक्त केलं आणि आपण दुसरी एखादी बऱ्यापैकी जागा शोधू असं सुचवलं.पण शामली आणि त्यातल्या त्यात नवीनबाबूंना भरबाजारातली ती प्रशस्त जागा इतकी आवडली की,त्यांनी सगळे मुद्दे खोडून काढले.जागेचा सौदा लगेचच झाला.जागा विकणारा आणि घेणारा दोघांनीही घाईने हा व्यवहार खुशीने पूर्ण केला.ही अपशकुनी जागा डॉक्टरांचा विचार पालटण्याआधी विकणाऱ्याला विकायची होती आणि इतकी सोयीची आणि प्रशस्त जागा कुणा दुसऱ्याने विकत घेण्याआधी आपल्या नावावर व्हावी म्हणून नवीनबाबूंना घाई झाली होती.


आपल्या आवडत्या जोडप्याने ही जागा विकत घ्यायचा निर्णय घ्यावा आणि घर-दवाखाना बांधण्यासाठी पिंपळाचा वृक्ष तोडायचं ठरवावं,हे डॉ.पटेल ह्यांनाच काय,पण गावातल्या अनेकांना रुचलं नाही.कुणी आडूनआडून तर कुणी सरळ डॉक्टर नवीनबाबूंना-

शामलीबाईंना प्रत्यक्ष भेटून सांगण्याचा प्रयत्न केला. पण दोघांनीही त्याकडे दुर्लक्ष केलं.प्रत्येकाच्या मनात पाल चुकचुकत राहिली.डॉ.पटेल ह्यांनी तर ज्योतिषाकडे जाऊन त्याचं मतही विचारलं.त्याने 'जागा शांत वगैरे करून घराचा दोष काढता येईल पण कुठल्याही परिस्थितीत पिंपळ तोडू नये'असं बजावलं. डॉ.पटेलांनी हे नवीनबाबूंच्या कानावर घातलं पण त्यांनी वाद घालायचं टाळून पटेलांच्या बोलण्याकडे चक्क दुर्लक्ष केलं.


मुंबईच्या प्रसिद्ध आर्किटेक्टने घराचा नकाशा तयार केला.

जिल्ह्याच्या ठिकाणच्या एका कॉन्ट्रॅक्टरवर घर बांधण्याचं काम सोपवलं.समोरच्या दुकानाचं नाव जरी 'इथे वेळेवर काम होणार नाही'असं असलं तरी चक्रवर्तीच्या घराचं काम वेळेवर सुरू झालं.


तो वाडा पाडल्यावर मोकळी झालेली ती जागा पाहून साऱ्या गावकऱ्यांचे डोळे विस्फारले.इथे एवढी मोठी जागा असेल अशी कुणी कल्पनाच केली नव्हती.वाडा पाडल्याने पिंपळ,पार आणि पारावरचा तो शेंदूर फासलेला देव रस्त्यावरून ये जा करणाऱ्यांना दिसू लागले.प्रत्येक जण पिंपळ तोडल्याबद्दल मात्र नाराज होता.भीती व्यक्त करत होता.सगळ्यांनाच त्या देखण्या डॉक्टर दाम्पत्याविषयी आता काळजी वाटू लागली होती.ते दाम्पत्य मात्र स्वप्नपूर्ती होणार ह्या आनंदात होतं.दररोज सकाळी दवाखाना उघडण्याआधी थोडा वेळ आणि रविवारचा बराचसा वेळ नवीनबाबू नवीन जागेच्या साईटवर घालवत.बघता बघता घर पाडून झालं. मोकळी जागा मिळाली. तिच्यावर स्वच्छता झाली.आता वेळ होती कुऱ्हाड चालवायची.त्यासाठी मागेल तेवढी मजुरी देण्याची तयारी असूनसुद्धा मजूर काही मिळेनात.पण नवीनबाबू अशा गोष्टींनी मागे फिरणारे गृहस्थ नव्हते.त्यांनी कॉन्ट्रॅक्टरला बाहेरच्या गावांतून,गरज पडली तर बाहेरच्या प्रांतांतून मजूर आणायला फर्मावलं.कॉन्ट्रॅक्टरही जिद्दीला पेटला.त्याने प्रयत्नपूर्वक मजुरांची टोळी आणली.झाड तोडण्यासाठी म्युनिसिपालिटीची परवानगी काढली आणि मजुरांची टोळी कामाला लागली.कॉन्ट्रॅक्टर खरं तर मनातून घाबरला होता पण तसं निदान दाखवत तरी नव्हता. त्याने पारावरच्या देवाची पूजा केली.गावाबाहेरच्या तळ्याच्या बाजूला एक पाच फूट…अपुरे राहिलेला भाग पुढील लेखामध्ये..

२०/११/२५

गांधीवादाची शोकांतिका / The Tragedy of Gandhism

वि. म. दांडेकर..!


महात्मा गांधींच्या लोकोत्तर व्यक्तिमत्त्वाचे मूल्यमापन करताना अनेकांनी त्यांना अनेक नावांनी संबोधले आहे. पंडित जवाहरलाल नेहरूंनी त्यांना राष्ट्रपिता म्हटले. मला वाटते सर्व संबोधनांत हे संबोधन अधिक सार्थ आहे.महात्मा गांधींनी खऱ्याखुऱ्या अर्थाने भारताची राष्ट्रीय घडण केली.भारताच्या स्वातंत्र्यप्राप्तीकरता त्यांनी देशव्यापी चळवळ उभारली आणि शेवटपर्यंत तिचे नेतृत्व केले.त्याकरता आवश्यक ते राजकारणी व्यवहार कौशल्य त्यांच्यापाशी होते.परंतु तेवढ्याने राष्ट्रपिता या संबोधनास ते पात्र झाले नसते.कारण राजकीय स्वातंत्र्यप्राप्ती हा राष्ट्रीय घडणीचा केवळ एक भाग आहे.निव्वळ व्यवहारकुशल राजकारणाने कदाचित स्वातंत्र्यप्राप्ती झाली असती परंतु राष्ट्रनिर्मिती झाली नसती.राष्ट्राची घडण करावयाची तर राजकारणाला राजकीय तत्त्वज्ञानाची जोड द्यावी लागते हे त्यांनी आरंभीच ओळखले आणि प्रथमपासून आपल्या राजकारणाला तात्त्विक व नैतिक अधिष्ठान दिले. असे तत्त्वज्ञान सामान्यजनांपर्यंत पोहचवावयाचे तर त्याला थोडाबहुत आचारधर्म चिकटवावा लागतो. महात्मा गांधी हे एक अत्यंत कुशल समाजधुरीण असल्याने त्यांनी आपल्या तत्त्वज्ञानाला जनमनाची पकड घेईल असा आचारधर्म चिकटवला आणि शिस्तबद्ध राजकीय संघटना उभी करण्यास आवश्यक म्हणून या आचारधर्माचा आग्रह धरला.दुर्दैवाने महात्मा गांधींच्या काही अनुयायांना एवढा आचारधर्मच काय तो समजला.असा आचारधर्म स्थलकालपरिस्थितिसापेक्ष असतो आणि असावयास हवा हेही ते विसरले. दैनंदिन सामाजिक व राजकीय व्यवहार सांभाळण्याची जबाबदारी जशी महात्मा गांधींवर होती तशी या अनुयायांवर नव्हती.त्यामुळे खुद्द महात्मा गांधींनाही परवडणार नाही असा आचारधर्माचा आग्रह त्यांनी धरला.


'गांधींपेक्षाही कट्टर गांधीवादी' म्हणून त्यांना कोणी म्हटले तर 'आपले काही चुकत तर नाही ना?' असा विचार करण्याऐवजी त्यांना स्वतःचे कौतुकच वाटू लागले.या मंडळींनी गांधीवादाच्या नावाखाली एक नवीन कर्मकांडाचे स्तोम माजविले. कर्मकांडाच्या खोड्यात स्वतःला आणि गांधीवादाला अडकवून घेऊन सारा व्यवहारच अशक्यप्राय केला. स्वतःचे हसे करून घेतले आणि गांधीवाद अव्यवहार्य ठरविला.या एकांतिक गांधीवाद्यांच्या दुसऱ्या टोकाला स्वतःला 'बुद्धिवादी' म्हणवून घेणारी काही मंडळी होती.राजकारणाला तात्त्विक व नैतिक अधिष्ठान हवे ही गोष्टच मुळात या मंडळीच्या बुद्धीला गम्य झाली नाही. याचे कारण राजकीय स्वातंत्र्यप्राप्तीव्यतिरिक्त राष्ट्र उभारणीचे काही कार्य आहे हेच त्यांना उमगले नाही.स्वातंत्र्यप्राप्तीपुरते बोलावयाचे तर तेही त्यांच्यासारखे दहावीस बुद्धिमान आपल्या राजकीय कौशल्याने इंग्रजांपासून मिळवू शकतील अशी त्यांची मनोमन खात्री होती.ही मंडळी सर्व दृष्टींनी बुद्धिमान असली तरी जनमानसासंबंधीचे त्यांचे अज्ञान आश्चर्यकारक होते. राजकीय स्वातंत्र्यप्राप्ती आणि नवराष्ट्र उभारणीच्या या साऱ्या खटाटोपात जनताजनार्दन आणि जनमानस यांचा संबंध काय ह्याचेच आकलन त्यांना कधी झाले नाही.साहजिकच महात्मा गांधींच्या सर्वस्पर्शी,धुरंदर राजकीय नेतृत्वापुढे ही मंडळी हतप्रभ झाली.महात्मा गांधीच्या पश्चात् राष्ट्राच्या नेतृत्वाची धुरा पंडित जवाहरलाल नेहरूंच्याकडे आली.पंडित नेहरू बुद्धिवादी असले तरी त्यांना जनमानसाची पूर्ण ओळख होती.राजकारणाला तात्त्विक व नैतिक अधिष्ठान हवे हा गांधीवादाचा आशय त्यांनी जाणला होता.त्यामुळे त्यांनीही आपल्या राजकारणास विरोध वा विसंगत नाही परंतु तरीही स्वतंत्र अशा राजकीय तत्त्वज्ञानाची जोड दिली आणि राष्ट्रउभारणीचे कार्य चालू राहिले.पंडित नेहरूंच्या पश्चात् आज पुनश्च याविषयी बुद्धिभ्रंश झालेला दिसतो.भारताच्या राष्ट्रउभारणीचे कार्य अजून अपुरे आहे,ते आणखी काही पिढ्या चालू ठेवल्याशिवाय भारताचे राष्ट्रीय जीवन निर्वेध होणार नाही,सामाजिक व राजकीय नेत्यांची ही प्राथमिक जबाबदारी आहे इत्यादी गोष्टींचा आज विसर पडला आहे. साहजिकच राजकारणाला तात्त्विक व नैतिक अधिष्ठान राहिलेले नाही आणि त्याची गरजही वाटेनाशी झाली आहे.


किंबहुना सर्व तात्विक व नैतिक विचारांची 'पुस्तकी' म्हणून अवहेलना करावी आणि तत्त्वशून्य राजकारणाचा 'व्यवहारवाद' म्हणून उदोउदो करावा अशी प्रथा पडत आहे.एकांतिक गांधीवाद्यांनी एके काळी माजविलेल्या कर्मकांडाच्या स्तोमाची ही प्रतिक्रिया आहे.म्हणून राजकारण,समाजकारण किंबहुना सर्व मानवी व्यवहार त्यांना काहीतरी तात्त्विक वा नैतिक अधिष्ठान हवे हा जो गांधीवादाचा आशय आहे,त्याचा अर्थ समजावून घेतला पाहिजे. तात्त्विक अधिष्ठान म्हणजे तत्त्वज्ञानाची लोखंडी चौकट नव्हे.राजकारण,समाजकारण हे बोलून चालून मानवी व्यवहार आहेत.त्यांत वावरावयाचे तर व्यावहारिक तारतम्याचे स्वातंत्र्य हवे.परंतु म्हणून योग्य काय अयोग्य काय,न्याय्य काय अन्याय्य काय,नैतिक काय अनैतिक काय यासंबंधीचा निर्णय करणे सुटत नाही हे लक्षात ठेवले पाहिजे.हे निर्णय सुसंगतपणे करावयाचे तर कोण्यातरी तात्त्विक,नैतिक निकषाची गरज भासते. उपमाच द्यावयाची तर संगीतातील षड्जाची देता येईल. संगीतात षड्जाला जे महत्त्व आहे तेच राजकारणात समाजकारणात तात्त्विक वा नैतिक अधिष्ठानाला आहे. कलाकार त्याच्या आंतरिक स्वरात मिळेल तो षड्ज स्वीकारतो.त्यावर आपली बैठक स्थिर करतो. एवढे केले म्हणजे कोणताही राग कोणत्याही ढंगाने गाण्यास तो मोकळा असतो. मात्र स्वीकारलेला षड्ज त्याला सोडता येत नाही.षड्ज सुटला तर कलाकार काय गातो ते त्याचे त्यालाही कळणार नाही,तो भरकटत जाईल. सूर आणि बेसूर यांचा निर्णय करता येणार नाही.किंंबहूना संगीत संगीतच रहाणार नाही.तीच गोष्ट राजकारणाची आहे.राजकारणाला तात्त्विक,नैतिक अधिष्ठान नसेल तर योग्य काय अयोग्य काय,न्याय्य काय अन्याय्य काय,

नैतिक काय,अनैतिक काय,यांचा निर्णय करता येणार नाही.

राजकारणाच्या दृष्टीने हे सर्व प्रश्न अप्रस्तुत आहेत असे काही व्यवहारवादी मानतात, सत्तास्पर्धा एवढेच राजकारणाचे स्वरूप त्यांना समजते, त्यांना एवढेच सांगावयाचे की केवळ सत्तास्पर्धेत टिकून रहाण्याकरतासुद्धा राजकारणाला तात्त्विक,नैतिक अधिष्ठान असावे लागते.तत्त्वशून्य,दिशाहीन,सत्तास्पर्धेत भरकटत जाणारे राजकारण सामान्य जनता फार काळ मान्य करीत नाही.निव्वळ छक्क्यापंजांचे राजकारण खेळून सत्तेवर अबाधित रहाता येते अशी कोणा सत्ताधीशांची समजूत झाली असेल तर तो निव्वळ भ्रम आहे. त्याचा निरास होण्यास फार काळ लागणार नाही.


विशाल मानवतावाद आणि त्यांच्याशी सुसंगत अशी स्वनिष्ठा हे गांधीवादाचे षड्जपंचम आहेत.विशाल मानवतावादाने महात्मा गांधींनी आपल्या राजकारणास आवश्यक ते नैतिक अधिष्ठान दिले.स्वाभिमान व स्वनिष्ठेची तार छेडून त्यांनी राष्ट्रजागृतीचा मंत्र दिला. महात्मा गांधी उभे राहिले आणि भारत उभा राहिला. त्याकरिता राजकीय स्वातंत्र्य आणि आर्थिक विकास यांचीही वाट पहावी लागली नाही.राजकीय पारतंत्र्यात आणि आर्थिक दारिद्र्यातही देशाला मानवतावादाच्या नैतिक अधिष्ठानावर स्वाभिमानाने आणि स्वनिष्ठेने मान ताठ करून उभे राहणे शक्य आहे हे त्यांनी स्वतःच्या उदाहरणाने सिद्ध करून दाखविले.


गरीब माणसाने स्वाभिमानाने जगावयाचे तर दारिद्र्याबरोबर येणारे सर्व न्यूनगंड सोडून दिले पाहिजेत आणि आपले अंथरुण पाहून पाय पसरण्यास शिकले पाहिजे.श्रीमंत माणसाचा सहवास घडला म्हणजे गरीब माणसाला आपल्या अन्नवस्त्राबद्दल साहजिकच कमीपणा वाटतो आणि तो श्रीमंत अन्नवस्त्राचे नसते नाटक करू पाहतो.असल्या न्यूनगंडाने श्रीमंती येत नाही.मात्र स्वाभिमान नष्ट होतो आणि अंती अपमान पदरी येतो. महात्मा गांधींनी देशाला क्षणार्धात या न्यूनगंडापासून मुक्त केले आणि त्याचे प्रतीक म्हणून आपले अन्नवस्त्र, पुरे अपुरे असेल तसे,स्वाभिमानाने वापरण्यास शिकवले.गांधीवाद्यांनी त्याचा मथितार्थ बाजूस ठेवला आणि या साध्या व्यवहारी स्वाभिमानी शिकवणीचा अर्थ केला की माणसाने आपल्या भौतिक गरजाच शक्यतितक्या कमी केल्या पाहिजेत हीच गांधीवादाची शिकवण आहे.त्यातून काही प्रामाणिक कर्मकांड आणि पुष्कळशी भोंदूगिरी निर्माण झाली.


स्वाभिमानाबरोबरच महात्मा गांधींनी देशाला स्वनिष्ठेची शिकवण दिली.स्वनिष्ठा म्हणजे आम्ही आमच्यापाशी आहेत या साधनांनिशी स्वतःच्या पायावर उभे राहू आणि एक एक पाऊल पुढे टाकू,हा विश्वास. स्वावलंबनाने,स्वनिष्ठेने मनुष्य अंतर्मुख होतो.आपण आपल्यापाशी असलेल्या सर्व साहित्याचा,साधनांचा पूर्ण उपयोग करून घेत आहोत का हा प्रश्न सतत विचारीत राहतो.या उलट परावलंबनाचे आहे.परावलंबी मनुष्य बहिर्मुख असतो.कोणाच्या तरी साहाय्याखेरीज आपण आपल्या पायावर उभे राहूच शकत नाही अशीच मनाची धारणा असली म्हणजे मनुष्य स्वतःचे सामर्थ्य,साहित्य व साधने यांचा विचारच करीत नाही.आधुनिकता, अद्ययावतता यांनी दिपून गेल्यामुळे त्याला 'आपल्यापाशी असलेले साहित्य व साधने' निरुपयोगी वाटतात आणि तो अधिकाधिक परावलंबी बनतो.आपणापाशी असलेल्या साहित्यसाधनांचा पूर्ण उपयोग म्हणजे स्वनिष्ठा.तिचे प्रतीक म्हणून महात्मा गांधींनी सूतकताईचा कार्यक्रम सांगितला.परंतु गांधीवाद्यांनी त्याचाही मथितार्थ बाजूस ठेवून त्याचे कर्मकांड केले आणि त्यात सोवळे-ओवळे आणले. आहेत त्या साधनांवर निष्ठा म्हणजे नवीन साधने निषिद्ध असे ठरवले आणि आर्थिक प्राप्ती तत्त्वतःच अशक्य केली.


स्वाभिमान व स्वनिष्ठा या गांधीवादाच्या मूळतत्त्वांचा अशा रीतीने गांधीवाद्यांनी विपर्यास केल्यामुळे स्वतःस बुद्धिवादी म्हणवून घेणाऱ्या गांधीवादाच्या टीकाकारांना साहजिकच फावले.

गांधीवादाने गरीब माणसास स्वाभिमानाने जगण्यास शिकवले.

बुद्धिवाद्यांनी त्याचा अर्थ केला की गांधीवादास दारिद्रय मंजूर आहे. गांधीवाद हा तत्त्वतःच संपन्न जीवनाच्या विरोधी आहे. गांधीवादाने गरीब माणसास असेल त्या साहित्यानिशी कामास प्रवृत्त केले.बुद्धिवाद्यांनी त्याचा अर्थ केला की गांधीवादाचा नवीन साधनास आणि पर्यायाने विज्ञानासच विरोध आहे.तात्पर्य, गांधीवाद हा भौतिक व आर्थिक प्रगतीस विरोधी व मारक आहे असे बुद्धिवाद्यांनी ठरविले.


सध्या व्यवहारवादाचा अंमल जारी आहे. व्यवहारवादाला तात्त्विक व नैतिक अधिष्ठानाचे तर वावडे आहेच;परंतु साधा स्वाभिमानही आर्थिक विकासाच्या आड येतो.स्वाभिमान,वस्तुनिष्ठा या ऐवजी मतलब व स्वार्थ ह्याच आर्थिक विकासाच्या प्रेरणा आहेत असे व्यवहारवाद्यांनी ठरविलेले दिसते. 


त्यामुळे व्यवहारवादाचाच एक भाग म्हणून गांधीवादाचे केवळ ढोंग राहिले आहे.बाकी गांधीवादातील स्वाभिमान व स्वनिष्ठेचा विसर पडलेला आहे.आज देश स्वतंत्र असला तरी स्वातंत्रत्र्यरक्षणास अपरिहार्य अशा समजुतीने,देश आर्थिक दृष्ट्या पूर्वर्वीपेक्षा सुस्थितीत असतानाही अधिक आर्थिक विकासास अवश्य आहे अशा समजुतीने,व्यवहारवादी राजकीय व सामाजिक नेते आणि राज्यकर्ते जगभर लाचारपणे,दीनवाणे भीक मागत हिंडत आहेत.जेमतेम पंचवीस तीस वर्षापूर्वीच परतंत्र,पराधीन आणि पराभूत बनलेले स्वतंत्र भारताचे नेते,ही दोन चित्रे शेजारी शेजारी ठेवून बघण्याजोगी आहेत.राज्यकर्त्यांनी अंगीकारलेले हे परावलंबी धोरण देशात खोलवर रुजले आहे.कोठे काही फुकट मिळते का हे शोधत राज्यकर्ते जगभर भीक मागत हिंडत आहेत आणि सरकारकडून काही फुकट पदरात पाडून घेता येते का याचा शोध घेत देशातील नागरिक धावाधाव करीत आहेत.याला म्हणतात कल्याणकारी शासन! आपण बाहेर भीक मागावी आणि देशात लोकांना भीक मागण्यास शिकवावे असा हा सत्तेवर राहण्याचा सोपा मार्ग सापडला आहे.


मग स्वाभिमान व स्वनिष्ठेची आठवण कोणास होणार?


गांधी नावाचे महात्मा, संपादन-रॉय किणीकर,

साहाय्यक-अनिल किणीकर,डायमंड पब्लिकेशन


ही अधोगती थांबवायची असेल तर राष्ट्रकारणास मानवतावादाचे अधिष्ठान दिले पाहिजे आणि राष्ट्रउभारणीकरता स्वाभिमान व स्वनिष्ठेचा मंत्र जागृत ठेवला पाहिजे.गांधीवादाची ही त्रिसूत्री आहे. तिचे प्रतिबिंब दैनंदिन व्यवहारात पडू शकेल असा एकसर्वव्यापी सर्वस्पर्शी कार्यक्रमही महात्मा गांधीनी सांगितला आहे.तो आजही उपयोगी पडण्यासारखा आहे.वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छता आणि मलमूत्र-शेणकाडी इत्यादी त्याज्य वस्तूंचा संपूर्ण उपयोग हा तो कार्यक्रम होय.केवळ वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छतेने गरीब जीवनही किती तरी प्रसन्न करणे शक्य आहे.केवळ स्वच्छतेने नव्वद टक्के रोगराई नष्ट होईल त्याकरता कोणाच्याही मदतीची गरज नाही. स्वच्छता ही ज्याने त्याने आपल्या घरात आणि गावात करण्याची गोष्ट आहे. पण म्हणूनच ती आम्हास नको वाटते. औषधाने भागते मग रोजची उठण्याबसण्याची स्वच्छता कशाला? आज औषधपाण्याचा,दवाखान्याचा प्रसार झाला आहे.परंतु वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छतेत फारसा फरक पडलेला दिसत नाही. सार्वजनिक आरोग्य सुधारलेले दिसते ते औषधाने, स्वच्छेतेने नाही.प्रत्येकाला आपल्या गावात दवाखाना हवा.परंतु गावातील दुर्गंधी नाहीशी करण्यास कोणी तयार नाही.मलमूत्र,शेणकाडी इत्यादी वस्तू नीट गोळा करून त्यांचा सेंद्रिय खताकरता उपयोग केला तर गावातील दुर्गंधी जाईल,रोगराई नष्ट होईल आणि शिवाय शेतीच्या उत्पादनास हातभार लागेल.हेकरण्याकरता कोणाची मदत लागत नाही.हे आपले आपण करावयाचे आहे.भूमीतून आपण जो सत्त्वांश घेतो तो भूमीस परत करावयाचा आहे.तसे केले तर हीच भूमी आपणास अधिक आधार देईल.इतके हे साधे तत्त्व आहे.मग ते आपण का करीत नाही?कारण स्वावलंबन, स्वाभिमान, स्वनिष्ठा यासंबंधी लोकशिक्षण व लोकजागृती करण्यापेक्षा परकीयांकडून रासायनिक खते भीक मागून आणणे सरकारला सोपे वाटते आणि मलमूत्र-शेणकाडी यांचा रोजचा व्यवहार करण्यापेक्षा सल्फेटचे पोते उघडून टाकणे शेतकऱ्यास सोईचे वाटते.हे आज सुखकर वाटणारे परावलंबन परिणामी आत्मघाती ठरल्याखेरीज रहाणार नाही.हीच गांधीवादाची मुख्य शिकवण आहे.स्वाभिमान,स्वनिष्ठा आणि त्यांचे प्रतिबिंब दैनंदिन जीवनात पडू शकेल असा सर्वव्यापी,सर्वस्पर्शी कार्यक्रम हाच गांधीवादाचा आशय आहे.त्याचे आज पुनरुत्थान झाले पाहिजे.

१८/११/२५

शांत मनाचा स्पायनोझा / Spinoza of peace

तो आमच्या प्रार्थनांमुळे जय किंवा आमच्या शत्रूच्या प्रार्थनांमुळे अपराजय देत नसतो.आपणास जे सत् व असत् वाटते,त्याच्याशी त्या परमात्म्याला काही एक करावयाचे नाही,जे निर्माण केलेच पाहिजे असे परमेश्वराला वाटते ते तो आपल्या अनंत बुद्धीला योग्य वाटणाऱ्या नियमानुसार निर्माण करतो. या विश्वाला गतिमान ठेवणारे शाश्वत व सनातन यंत्र म्हणजे ईश्वर,पण या यंत्राला प्रेरणा देणाराही तोच व या यंत्राचे नियमन करणारी इच्छक्तीही तोच आणि शाश्वत गतिमान व शाश्वत प्राणमय अशा या शक्तियंत्रातले आपण सारे आवश्यक असे भाग आहोत आणि त्या अनंत शक्तिमान यंत्रालाच आपण अधिक सुटसुटीत नाव न सापडल्यामुळे ईश्वर म्हणून संबोधितो.


ईश्वरी इच्छा म्हणजेच निसर्गाचा कायदा.प्रकाश ताऱ्यांताऱ्यांपर्यंत सारखा फिरत आहे.मनुष्याची जाणीवशक्ती सारखी काम करीत आहे.कारण ती सर्व ईश्वरी इच्छेचा कायदा मानतात.प्रकाश प्रकाशाचा आवश्यक कायदा मानतो.मनुष्याची जाणीव जीवनाचा कायदा मानते.आपली मानवी इच्छाशक्तीही आवश्यक अशा नियमांचे पालन करते,जगात फ्री वुइल किंवा इच्छास्वातंत्र्य अशी चीज नाहीच.आपण परिस्थितीची बाळे आहोत.परिस्थिती आपणास बनवते.स्पायनोझा लिहितो,'आपल्या मनात केवळ 'सर्वतंत्रस्वतंत्र' असे काहीच नाही.आपणास इच्छास्वातंत्र्य नाही.आपण जी काही इच्छा मनात करतो,ती कोणत्यातरी कारणामुळे असते.त्या कारणाला दुसरे कारण असते.त्या दुसऱ्या कारणाला तिसरे कारण असते.अशा प्रकारे कार्यकारणपरंपरा अनंत असते.' दुसऱ्या शब्दांत हेच सांगायचे तर असे म्हणता येईल की, आपल्या तोंडावरचे भाव किंवा शरीराचे स्नायू यांच्याप्रमाणेच आपली सारी कर्मेही नैसर्गिक शक्तींवरच अवलंबून असतात. या नैसर्गिक शक्ती आपली कल्पनाशक्ती भूतकाळात मागे पाहू शकेल तेथपासून सारख्या चालूच आहेत. अनंत काळापासूनच म्हणा ना! निसर्गाच्या नियत नियमाप्रमाणे असे कायमचेच ठरलेले आहे की,दैवी संगीत लिहिण्याला बीथोव्हेन जन्मावा. लाखो लोकांना हिंसक मरणाकडे नेण्याला नेपोलियन निर्माण व्हावा.आकाशातून खाली पडणाऱ्या पावसाला स्वातंत्र्य नाही.अगर धनुष्यापासून सुटलेल्या बाणाची दिशा बदलता येत नाही.त्याचप्रमाणे आपली कर्मेही नियतच आहेत.आपली इच्छा असो नसो ती तशीच हातून घडावयाचीच.बाणाची गती व मानवाचे कर्म यात फरक इतकाच की,मानवाला आपल्या कर्माची जाणीव असते.स्वकर्माचे भान असते आणि या केवळ जाणिवेलाच तो चुकून आपली इच्छाशक्ती मानतो.आपण काय करतो ते आपणास माहीत असते.पण ते करणे भागच असते..तद्विपरीत वागण्याचे सामर्थ्य वा स्वातंत्र्य आपणास नसते.आपण आपल्या नियतीशी निबद्ध आहोत.


आपल्या जीवनाच्या या छोट्या नाटकात केवळ प्रेक्षक म्हणून राहण्यास आपणास परवानगी आहे.पण त्यात ढवळाढवळ करायला,तिथे लुडबुड करण्यास,आपली इच्छा सोडण्याला आपणास परवानगी नाही.आपल्या कर्माकडे पाहण्याची आपणास पूर्ण मुभा आहे.पण आपली कर्मे आपणच ठरवतो असे जे आपणास वाटते ते मात्र चूक आहे.आपण जे काही निर्णय घेतो ते केवळ आपल्याच भूतकाळाचे, गतजन्मीचे परिणाम नसून आपल्या सर्व पूर्वजांच्या मागील जन्मांचा तो परिणाम असतो.


म्हणून स्पायनोझा शेक्सपिअरच्या अपूर्व बुद्धिमत्तेबद्दल त्याची स्तुती करीत नाही किंवा खुनी माणसाने केलेल्या गुन्ह्यांसाठी त्याच्यावर रागावत नाही.तो लिहितो, 'आपणाकडून दुसऱ्यांचा उपहास होऊ नये,तसेच स्वतःला कधीही दुःख होऊ नये.

आपणाकडून कोणीही तिरस्कारिला जाऊ नये म्हणून मी फार जपतो.मानवी मनुष्यांच्या हातून होणारी नानाविध कर्मे समजून घेण्याचा प्रयत्न मी काळजीपूर्वक केला आहे.' तो गुन्हेगाराला शासन करील;पण सूडबुद्धीने मात्र नव्हे,तर त्याच्यापासून समाजाचे रक्षण व्हावे म्हणून.थंडगार वाऱ्यामुळे पडसे आले म्हणून काय आपण वाऱ्यावर रागावतो ? त्या वाऱ्याविषयी आपली जी उदासीन, अनासक्त भावना असते.तीच स्पायनोझा आपल्या निंदकांविषयी व अपायकर्त्यांविषयी ठेवी.त्याची एक प्रकारची शास्त्रीय अनासक्ती असे.कार्यकारणभावाच्या अनंत साखळीतील प्रत्येक वस्तू अपरिहार्य असा दुवा आहे,हे त्याने जाणले होते.तो प्रत्येक नैसर्गिक कर्म वा मानवी कर्म शाश्वततेच्या प्रकाशात पाहतो व अविचल राहतो.अशा प्रकारे शाश्वततेच्या आरशात पाहिल्यावर स्पायनोझा आपणास जसे पाहतो.त्याप्रमाणे आपण आपणास पाहण्याची खटपट करू या.प्रत्येक सजीव वस्तू ईश्वराचाच अंश आहे. काळाच्या पृष्ठावर साकार रूपाने,मूर्त रूपाने,प्रकट झालेला ईश्वराच्या अमर महाकाव्यातील विचार म्हणजे प्रत्येक जीव.पृष्ठ नष्ट झाले की काव्याचे मूर्त स्वरूप नष्ट होते,अदृश्य होते. पण तो विचार अदृश्य झाला तरी मरत नाही.होमरची कविता असलेले पुस्तक फाटले,म्हणजे होमरची कविता नष्ट झाली असे होत नाही.त्या कवितेचे केवळ ते मुद्रण नष्ट होते.होमरचे विचार अनेक पृष्ठांवर छापलेले आहे. ती पृष्ठे नष्ट करता आली,तरी ते विचार नष्ट करता येणार नाहीत.शरीर मरते,


पण आत्मा राहतोच.रूपक बदलून असे म्हणता येईल की,प्रत्येक जीव म्हणजे जीवनाच्या कॅलिडोस्कोपमधील रंगीत काचेचा एक तुकडा आहे. पुन्हा रूपक बदलून असेही म्हणता येईल की,

ईश्वराचा आत्मा,तो परमात्मा किंवा ईश्वरी योजना म्हणजे एक सूर्य आहे व मानवी शरीर म्हणजे पंकिल पल्वल आहे. ते तळे आटले - म्हणजेच हे शरीर मेले की सूर्याचे प्रतिबिंब नाहीसे होते.पण सूर्य पहिल्याप्रमाणेच तेजाने तळपत असतो.दुसऱ्या शब्दांत बोलायचे तर असे म्हणता येईल की,प्रत्येक मानवी प्राणी म्हणजे दैवी ब्रह्माचा अंश आहे.व्यक्ती मरते म्हणजे बिंदू सिंधूत मिळून जावा त्याप्रमाणे आत्मा परमात्म्यात विलीन होतो.एखादी तान महासंगीतात विलीन व्हावी तसा आत्मा परमात्म्यात मिळून जातो.क्षणभर दिक्कालात आलेला स्थानबद्ध झालेला तो भव्यदिव्य विचार पुन्हा शाश्वततेच्या योजनेत जाऊन बसतो.


'शरीरनाशाबरोबर मानवी मनाचा संपूर्ण नाश होणे शक्य नाही.... सद्गुणी आत्मे ईश्वरी अंशाचे असल्यामुळे दैवी ज्ञानाचे अंशभाक असल्यामुळे चिरंजीवच आहेत.'


मानवी प्राणी म्हणजे इतस्ततःविखुरलेले पृथक् व अलग जीव नव्हेत.प्रत्येक केवळ स्वतःसाठी धडपडणारा व स्वतःपुरता जगणारा नाही.आपण सारे त्या दैवी ब्रह्माचे संबद्ध भाग आहोत.आपणास माहीत असो वा नसो, आपण सारे एकाच ध्येयासाठी धडपडत आहोत.आपण सर्व एकाच कुटुंबाचे घटक आहोत.एवढेच नव्हे,तर आपण एकाच विराट शरीराचे अणू आहोत.अगदी क्षुद्रतम माणसावर केलेला प्रहारही सान्या मानवजातीच्या शरीरावरील आघात होय. एखाद्या क्षुद्र व्यक्तीविरुद्ध केलेला अन्याय साऱ्या मानवजातीवरीलच अन्याय होय.जो आपल्या सर्व मानवबंधूंना सहानुभूती दाखवतो,जो सर्वांवर प्रेम करतो,तो जीवनाच्या स्वरूपाशी सुसंवादी आहे,असे म्हणावे.स्पायनोझाच्या मताचा 


वॉल्ट व्हिटमन् लिहितो,'सहानुभूतिशून्य हृदयाने तुम्ही एक फर्लांग चाललात,तर आपले कफन पांघरून तुम्ही आपलीच प्रेतयात्रा काढली,असे म्हणण्यास हरकत नाही.'


दुसऱ्याचे सुख वाढवून त्यायोगे स्वतः सुख मिळवणे हे मानवी जीवनाचे साध्य आहे.'शहाणा माणूस जी गोष्ट दुसऱ्यासाठी इच्छित नाही ती तो स्वतःसाठीही इच्छित नाही.'अल्पसंतुष्ट असणे,द्वेषाची परतफेड प्रेमाने करणे, दैवाने जे जे भोगावे लागेल ते ते आनंदाने व धैर्याने हसत हसत सहन करणे म्हणजेच भले जीवन,अर्थात स्पायनोझाच्या मते प्रज्ञावंतांचा संपूर्ण मार्ग अगर श्रेष्ठांचा निर्दोष मार्ग होय.मुख्य गोष्ट ही की,सर्व जगाशी एकरूप होऊन राहण्यात आनंद मानावयास शिका. तुमचे तसेच तुमच्या शेजाऱ्याचे जीवन कितीही क्षुद्र असले तरी,या विश्वाच्या विराट वस्त्रातील ते आवश्यक असे धागे आहेत, हे कधीही विसरू नका.आपल्या मनाचे सर्व निसर्गाशी ऐक्य आहे याची जाणीव वा याचे ज्ञान असणे ही परम मंगल व कल्याणप्रद गोष्ट. होय.' हे जग तुमच्यासाठी केलेले नसले, तरी निदान तुम्ही तरी या जगासाठी केले गेले आहात. तुम्ही या जीवनाच्या ग्रंथांतील एक महत्त्वाचे पृष्ठ आहात. तुम्ही नसाल तर तो अपूर्ण व अपुरा राहील हे विसरू नका.


स्पायनोझाचे जीवन अतिसुंदर व रमणीय,पण फारच अल्प होते.एका जागेहून दुसऱ्या जागी असा तो सारखा फिरत होता.शेवटी हेग येथे एका मित्राच्या घरी तो राहिला.त्याच्या हयातीतच हे घर यात्रेचे ठिकाण झाले. स्पायनोझाच्या दर्शनाला त्याच्या काळातील सारे महाबुद्धिमान,प्रज्ञावंत व प्रतिभाशाली लोक येत.तो आपल्या काळातील महर्षी होता.बुद्धिमंतांचा राणा होता.या घरातच तो बसे.आजूबाजूला शारीरिक व्यवसायाची हत्यारे पडलेली असत.त्याच्या अंगावर साथे कपडे असत.

कपड्यांबाबत तो एकदा म्हणाला, 'शरीर ही काय फार मोलाची वस्तु आहे? ही साधी वस्तू फार मौल्यवान कपड्यात कशाला गुंडाळायची?' येथे बसून तो मित्रांचे स्वागत करी,येथेच बसल्याबसल्या त्याने ते अमर नीतिशास्त्र लिहिले,हा ग्रंथ त्याचे हस्तलिखित त्याच्या मित्रांनी वाचले होते व समक्ष तोंडी, तशीच पत्रांनी त्यांनी त्यावर चर्चा केली होती.हा ग्रंथ त्याच्या मरणोत्तर छापला गेला.फ्रान्स व हॉलंड यांचे युद्ध या वेळी चालले होते.

राज्यकर्त्यांच्या महत्त्वाकांक्षा व सेनापतींच्या हालचाली व हुलकावण्या यांकडे त्याचे लक्ष नसे.त्याला त्यांची गोडी नव्हती.त्याला शत्रूविषयी देशबांधवांइतकाच आदर वाटे.त्याचा आनंद एकच होता,तो म्हणजे तत्त्वज्ञानविषयक.


एकदा तर एखाद्या निष्पाप मुलाप्रमाणे,एखाधा विश्वप्रेमी संताप्रमाणे तो शत्रुसैन्याच्या सेनापतीने बोलावल्यावरून शत्रूच्या गोटात गेला.सेनापती प्रिन्स कोडे याला स्पायनोझाशी थोडी तात्त्विक चर्चा करायची होती,थोड्या तात्त्विक गप्पा मारायच्या होत्या.त्या वेळी तो चुकून शत्रूचा हेर म्हणून फाशीच दिला जाणार होता.आपण देशद्रोही नाही,अशी आपल्या देशबांधवांची खात्री पटविण्याच्या कामी सुदैवाने त्याला यश आले म्हणून बरे.आपण निरुपद्रवी ज्ञानोपासक आहोत हे त्याने पटवून दिले म्हणूनच त्याचे प्राण वाचले.पण त्याचे प्राण फार दिवस वाचायचे नव्हते.त्याची प्रकृती झपाट्याने खालावत होती.१६७७ सालच्या हिवाळ्यात त्याची खालावलेली प्रकृती अधिकच खंगली व फेब्रुवारीच्या बाविसाव्या तारखेस तो मरण पावला. त्याच्या घराचा मालक व त्याच्या घराची मालकीण चर्चमध्ये गेली होती.त्याचा वैद्य तेवढा त्याच्याजवळ होता.त्याने टेबलावर असलेले सर्व पैसे लांबवले. चांदीच्या मुठीचा एक चाकूही गिळंकृत केलाआणि मृतदेह तसाच टाकून तो निघून गेला.स्पायनोझा हे पाहायला असता तर पोट धरून हसला असता.मरणसमयी त्याचे वय फक्त चव्वेचाळीस वर्षांचे होते. त्याच्या मनोबुद्धीचा पूर्ण विकास होण्याची वेळ येत होती.तो परिणतप्रज्ञ होत होता.अशा वेळी घाला आला आणि तो गेला.पण रेननच्या शब्दात म्हणू या की, 'ईश्वराची अत्यंत सत्यमय दृष्टी आजपर्यंत जर कोणी दिली असेल,तर ती स्पायनोझाने.ती दृष्टी देऊन तो गेला.'शोरमॅचर लिहितो,'विचाराच्या क्षेत्रात स्पायनोझा अद्वितीय आहे.त्याच्याजवळ कोणीही जाऊ शकत नाही.तो आपल्या कलेचा स्वामी आहे.या क्षुद्र जगाच्या फार वर तो आहे.या क्षुद्र जगात त्याला अनुयायी नाहीत व कोठेही नागरिकत्व नाही.तो जणू या जगाचा नाहीच.'


असे म्हणतात की,इतिहासात खरे निर्दोष ख्रिश्चन दोनच होऊन गेले.येशू व स्पायनोझा आणि दोघेही ज्यूच होते.