* विजय गायकवाड | Vijay Gaikawad

live

नमस्कार आपले स्वागत आहे. मी पुस्तके आणि मित्रांवर पैसे खर्च करतो,माझ्याकडे दगड आणि विटांवर खर्च करण्यासाठी पैसे नाहीत.-रस्किन बाँड. ही थोर माणसं व त्यांचे विचार मला पुस्तकात भेटलीत.ती भेटली आणि त्यांनी सांगितले कि,प्रत्येक दिवशी असं काही तरी करा की,ते तुम्हाला अधिक सुंदर उद्याच्या दिशेने खूप लांबवर घेऊन जाईल."- डोग फायरबाऊ.'तुम्हाला जर संधी मिळाली तर तुम्ही तुमची मुलं जाळून टाकाल,की तुमची पुस्तकं ?' असा विचित्र प्रश्न स्किनरनं त्याच्या पहिल्याच टेलिव्हिजनच्या कार्यक्रमात प्रेक्षकांना थेटपणे विचारला होता आणि इतकंच नाही,तर 'मी तर मुलांनाच जाळेन,कारण मानवी प्रगतीमध्ये माझ्या पुस्तकांमुळे माझ्या जीन्सपेक्षा जास्त योगदान मिळेल,'असंही त्या प्रश्नांचं स्वत:च सरळपणे उत्तरही दिलं होतं! सर्वियन कादंबरीकार मिलोराद पावीच यांचे एक वाक्य आहे ते म्हणतात - जोवर जगात पुस्तक वाचणाऱ्या वाचकांची संख्या बंदूकधारी सैनिका पेक्षा अधिक आहे तोवर काळजीच काहीच कारण नाही.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात.पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये.म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे मार्गदर्शक, सहकारी धावून येतात.प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,डॉ.दीपक शेटे,आ.भरत बुटाले,प्रा.सर्जेराव राऊत,सुभाष ढगे,अनिल फारणे,डॉ.सुधीर सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,जज्ज,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, पुस्तकातील घटना प्रसंग सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर' पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी पुस्तके, लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत.... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ.मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. - मॅट्रिक फेल विजय गायकवाड

२५/१०/२३

माणुसकी शिकवणारी 'हडळ '.. 'Strike' that teaches humanity..

मी नववीत असेन बहुधा.साता-यातुन मी त्यावेळी आजीकडे आलो होतो ऊन्हाळ्याच्या सुट्टीला.मे महिन्याचा शेवटचा आठवडा असावा, ढग दाटुन यायचे पण पाऊस पडायचा नाही.खुप रडावंसं वाटतं,मन भरुन येतं,पण रडु येत नाही तसंच काहिसं ! 


त्या दिवशी आजीबरोबर माझी काहितरी वादावादी झाली होती,रागानं दिवसभर जेवलो नव्हतो,तीनेही बोलावलं नाही.रागाच्या तिरीमिरीत गल्लीतल्या मित्राकडे जायला निघालो. 


संध्याकाळचे ७ वाजले असावेत.अंधार आणि उजेड एकमेकांना आलिंगन देत पहले आप पहले आप म्हणुन निरोप देत असावेत... 


निम्म्या वाटेवर आल्यावर नेमका गडगडाट सुरु झाला,

काळोख पडला आणि काय होतंय कळायच्या आत धो धो पाऊस सुरु झाला.मी चिंब... ! 


पावसापासुन बचाव करायचा म्हणुन जवळच्याच एका घरात शिरलो. 


घर कसलं ? पत्रे,गोणपाट लावुन केलेला तो एक निवारा होता.आमच्या गल्लीतलं सगळ्यात गरीब कुटुंब हे... ! 


आम्ही जीथे रहायचो,तीथे एक पन्नाशीची बाई रहायची.शेजारच्या आयाबाया तीला "हडळ" म्हणायच्या.ती दिसायलाही होती तशीच. 


डावा डोळा एकदम बारीक,या डोळ्यात काळं बुब्बुळ नव्हतंच,आख्खा डोळा पांढराफेक, उजवा डोळा बाहेर आल्यासारखा बटबटीत, आतलं बुब्बुळ तीच्या मर्जीविरुद्ध कुठेही गरागरा फिरायचं,या वयातही चेहरा सुरकुतलेला,पांढरे केस पिंजारलेले,तोंडात मोजके दात,

त्यातुन समोरचा एक पडलेला,दुसरा ओठातुनही बाहेर आलेला,अंगावर लुगडं घातलंय की चुकुन अंगावर पडलंय अशी शंका यावी असं नेसलेलं, रंगही इतका काळा,की काळ्या रंगानं लाजावं.!


एकुण अवतार भेसुर ! 


त्यांत बोलणं असं की भांडल्यागत... ! 

प्रत्येक वाक्यात शिवी... ! 


कुणीही हिच्या नादी लागत नसे,समोर दिसली तरी विटाळ व्हायचा लोकांना,अपशकुन व्हायचा त्यांना,कोणत्याही सण समारंभात हिला जाणिवपुर्वक बाजुला ठेवायचे.

लहान मुलांना तर ती हडळ तुला खाईल अशी भिती घालायचे... !


तीला जादुटोणा येतो,तीच्या घरात कवट्या आहेत वैगेरे असंही  बोललं जायचं...


हे घर तीचंच... ! 


मी नेमका याच घरात शिरलो होतो.


पत्र्याच्या त्या घरात मंद चुल पेटली होती,शेजारचा टेंभा (जुन्या डब्यात राॕकेल भरुन,जुनी नाडी टाकुन,उजेडासाठी वात पेटवलेली असे, गावाकडचा जुगाड) मिणमिणता प्रकाश देत होता. 


ती चुलीशेजारीच बसली होती,त्याच नेहमीच्या विस्कटलेल्या अवतारात... केस तसेच पिंजारलेले... चुल आणि टेंभ्याचा संमिश्र प्रकाश तीच्या भेसुर चेह-यावर पडला होता.मुळचाच भिषण चेहरा अजुन भितीदायक वाटत होता. विरुद्ध बाजुला तीचीच सावली जमिनीवर पडली होती. 


एकुण वातावरण भितीदायक ! 


मी घाबरलो, पण बाहेर पडायची सोय नव्हती... 


'काय रं...?' घोग-या आवाजात ती गरजली. 


'काय नाय,ते आपलं भायेर पाऊस म्हणुन...' मी पायानं जमिन टोकरत चाचरत बोललो. 


ती बसली होती... समोर काटवटीत भाकरीचं पीठ ओतलं होतं. 


पुर्वी डालड्याचा पिवळा डब्बा मिळत असे, त्यावर कसल्याशा झाडाचं चित्रं असे.डब्यातला डालडा संपला की त्याचे अनेक ऊपयोग असत.कुणी डाळी तांदुळ त्यांत साठवत असत,कुणी टमरेल म्हणुनही वापरे.तीनं याच डब्यात पाणी भरुन ठेवलं होतं.डब्बा काटवटी शेजारी.

डब्ब्यातलं पाणी पीठावर शिंपडुन ती पीठ तिंबत होती. 


मांजरानं उंदराला खेळवावं तसं ती पिठाशी खेळत होती, इकडुन तिकडे फिरवत होती, मध्येच चापट्या मारत होती,मध्येच पीठाचा गालगुच्चा घेत होती. 


मी हा खेळ पाहण्यात रंगुन गेलो ! 


शेवटी त्या गोळ्याचा भला मोठा लचका तीनं तोडला... दोन हाताच्या तळव्यात धरुन या लचक्याला तीनं गोल आकार दिला... आणि हातातुन पडु न देता त्या गोळ्याला हवेतच थापट्या मारु लागली,दोन्ही बाजुंनी ढोलकी बडवतात तसं...! 


एका क्षणी तर जादु झाली...या गोल गोळ्यापासुन एक सुंदर गोलाकार अशी ताटाएव्हढ्या आकाराची पोळी तयार झाली.माझी आजी पोळपाटावर भाकरी थापते,हिनं हवेतच ती केली.हिच्या अंगात नक्की जादुटोणा असावा अशी माझी खात्री पटली. 


यानंतर तीने बनवलेली ती कलाकृती धाप्पदिशी, चुलीवरल्या तापलेल्या काळ्या लोखंडी तव्यावर पसरली.डब्ब्यातनं पाणी घेवुन पुन्हा पाण्याचा हात त्या भाकरीवरनं फिरवला.शेणानं सारवलेल्या जमिनीवर उलथन पडलं होतं,तीनं आधी ते पदराला पुसलं,उलथनानं तव्याला थोडं ढोसुन चुलीवरल्या तव्याला नीट केलं आणि हातानं तव्यावरची भाकरी उलटली. 


उलटलेली भाकरी पुन्हा तव्यावरनं काढुन चुलीच्या तोंडावर तीला धग लागेल अशी ठेवली…आता त्या बाजरीच्या भाकरीला मस्त पापुद्रा आला... ती टम्म फुगली... दिवसभर मी फुगलो होतो तस्साच ! 


तीचं माझ्याकडं लक्ष नव्हतंच.बाजरीच्या भाकरीचा मंद सुवास माझ्या नाकात शिरला. 


पत्र्याबाहेर अंधार,नुकताच पडुन गेलेला पाऊस,हवेत झोंबरा गारवा,पत्र्याच्या आत चुलीमुळं निर्माण झालेली ऊबदार धग आणि माझ्या पोटात पडलेली आग ! 


मी आशाळभुतपणे भाकरीकडं पहात होतो. 

तीचं माझ्याकडं लक्ष गेलं. 

म्हणाली,'खातु का भाकर... ?' 

'छ्या..छ्या... नको मला..' एकदम हो कसं म्हणणार ?


एखादी गोष्ट मनापासुन हवी असतांना,ती मिळत असतां,नको म्हणणं काय असतं,हे त्या नको म्हणणाऱ्याला कळेल ! 


तोंडानं नाही म्हटलं तरी काही गोष्टी चेह-यावर ओघळतातच,मनात असलं - नसलं तरी !

डोक्यावर ओतलेल्या तेलाचे गालावर ओघळ यावेत तसे... ! तीला या अंधारातही ते दिसलं असावं. 


म्हणाली,' हिकडं ये...' 

जावु का नको ? मी घुटमळलो... 

'ये रं ल्येकरा,माज्याजवळ बस... ये हिकडं ...' 


मी प्रथमच तीचा हा नाजुक आणि प्रेमळ आवाज ऐकत होतो.मायेनं भिजलेला तो आवाज होता...तरीही,जवळ बोलवुन भाकरीबरोबर ही मलाच खावुन टाकणार नाही ना ? या विचारानं मी घाबरलो... तीनं पुन्हा हाक मारली,

मी पाय ओढत तीच्या दिशेनं घाबरत निघालो. 


मी जवळ येतांना पाहताच ती गालातल्या गालात मंद हसली,मी असं हसतांना या आधी कधीच पाहिलं नव्हतं.का हसली असेल ती अशी ? 


मी आणखी घाबरलो,आता पळायची सोय नव्हती,तीनं माझे हात धरले होते.


माझे थरथरते हात तीने हातात घेतले आणि झटका देत मला चुलीजवळ खाली बसवलं.चुलीजवळ असुनही मला कापरं भरलं.ती पुन्हा हसली,ओठाबाहेर आलेला दात मला अजुन भ्या दावत होता...


'कवापस्नं जेवला न्हाईस ?' डोक्यावर हात फिरवत मायेनं तीनं विचारलं. 


'सकाळपस्नं...' मी चाचरत बोललो. 


शेणानं सारवलेल्या जमिनीवरच एक जर्मनची ताटली पडली होती,तीनं ती पदरानं पुसली,त्यावर ती गरमगरम भाकरी ठेवली. 


मी अजुनही साशंक होतो,ती पुढं काय करणार मला माहित नव्हतं.तीच्याबद्दल लोक कायकाय बोलतात ते सारं आठवलं.अंगावर शहारे आले...


'तु भाकर खायाला सुरवात कर,मी तवर भाजी करते' या वाक्यानं माझी तंद्री भंगली. 


तेव्हढ्यात तीनं,बाजुला असलेली कळकटलेली एक छोटी किटली काढली,दुस-या हातानं तितकीच कळकट एक कढई चुलीवर ठेवली. 


किटलीतलं तेल कढईत टाकलं,किटलीच्या तोंडाला लागलेलं तेल तीनं बोटानं पुसुन घेतलं आणि ते बोट माझ्या केसांना लावत म्हणाली... 'रोजच्या रोज आंगुळ झाल्यावर,डोस्क्याला त्याल लावावं... कसं भुतावानी झाल्यात क्यास... !' असं म्हणत पुन्हा तेच बोट स्वतःच्या पदराला पुसलं. 


मी तीच्या पिंजारलेल्या केसांकडे पाहिलं,वाटलं मला सांगते तर मग हि का लावत नसेल डोक्याला तेल ? 


भुतावानी हा तीच्या तोंडुन आलेला शब्द ऐकुन मी अजुन घाबरलो. 


तीला याचं काही सोयरसुतक नव्हतं.शांतपणे जरा लांब हात करुन तीने मग लसणाची गड्डी काढली,जमिनीत उकरुन केलेल्या उखळात टाकली,वरवंट्यानं दणादणा चेचली आणि कढईतल्या तेलात टाकली.उखळ पुन्हा त्याच पदरानं पुसुन घेतलं...


यानंतर गुडघ्यावर हात ठेवत ती भिंतीच्या आधारानं उठली आणि कसल्याशा फडक्याखाली झाकलेली मेथीची गड्डी काढली. 


बुडख्याकडचा (देठाकडचा) भाग हातानंच पिळुन तट्दिशी तोडला आणि आख्खी मेथीची गड्डी तीनं अक्षरशःहातानं कुस्करुन कढईत टाकली.ना निवडणं,ना साफ करणं,ना देठ काढणं...! 


मेथी गरम तेलात पडली,अगोदरच खमंग तळला गेलेला तांबुस लसुण जणु मेथीची वाट बघत होता... मेथीची आणि त्याची कढईत भेट झाल्यावर "छिस्स्स" असा आवाज आला.


हा आवाज मी अजुन विसरलो नाही,विसरुच शकत नाही. 


यानंतर तीने,पुन्हा उलथन घेतलं,पदराला पुसलं, भाजी हलवली आणि त्यावर मीठ टाकलं...! 


कढईतुनच चिमटीत धरुन तीनं ही भाजी माझ्या हिरव्यागार भाकरीवर टाकली. 


मी तीच्याकडे नुसता पहात होतो. माझ्या गालावरनं खरबरीत हात फिरवत म्हणाली, 'खा ल्येकरा खा... सकाळधरनं उपाशी हायस बाबा... ' 


यानंतर मी त्या गरमगरम भाजी भाकरीवर तुटुन पडलो,मला आठवतं,मी त्यावेळी दोन भाकरी आणि सगळी भाजी फस्त केली होती.


अन्न हे पुर्णब्रम्ह याची प्रथमच जाणिव झाली. पोट तुडुंब भरलं होतं,मनही ! 


मी सहज पाहिलं काठवठीत,तीच्यापुरत्या असणा-या पीठाच्या सर्व भाकरी मी खाल्ल्या होत्या,फडक्याखाली आता भाजी शिल्लक नव्हती,डब्ब्यात अजुन पीठ शिल्लक असेल की नाही ते मला माहीत नव्हतं. 


मला माझीच लाज वाटायला लागली. 


गंमत अशी की पोट भरल्यावरच लाजेची जाणिव होते,ऊपाशीपोटी नाही !


चुलीजवळ बसुन मला घाम आला होता,मी तीच्याजवळ जात म्हणालो,'मावशी,आता तु काय खाशील ?' 


आयुष्यात पहिल्यांदाच कुणीतरी तीला मावशी म्हटलं असावं. 


तीच्या डोळ्यांतुन घळाघळा पाणी वहायला लागलं.गरागरा फिरणारे डोळे कुठंच ठरत नव्हते, हुंदका येत होता,त्यालाही ती दाबत होती...


तीने ओठ मुडपले होते,त्यांतुनही एक दांत डोकावत होताच. 


मला जवळ घेत पुन्हा त्याच पदरानं माझ्या कपाळावरला तीनं घाम पुसला. 


या पदरातुन मला वास आला शेणानं सारवलेल्या जमिनीचा,उखळात चेचलेल्या लसणाचा, डोक्याला लावलेल्या तेलाचा,माझ्याच घाबरट घामाचा आणि तीच्यातल्या पान्हा फुटलेल्या आईचा !


या पदरानं मी सुगंधी झालो ! 

आता मला तीची भिती वाटत नव्हती. 


जगात आपलं म्हणुन कुणीही नसलेली एक समाजानं टाकलेली बाई,तीच्याही नकळत आई होवुन गेली ! 


पदरालाही किती पदर असतात ना ? वरवर फाटका

दिसणारा पदर किती मजबुत असु शकतो?


प्रत्येक आई मुलाचं नातं,पदरापासुन सुरु होतं... पदराशी संपतं... ! 


या दोन पदरांतला काळ म्हणजे आयुष्य !


आयुष्यांत मला अशी बाजरीची भाकरी आणि मेथीची भाजी पुन्हा कुठंही मिळाली नाही ! 


इंटरनॅशनल कंपनीत काम करतांना अनेकानेक फाईव्ह स्टार हाॕटेलात राहिलो,जेवलो. 


मेनुकार्डवर व्हेजच्या रकान्यात शोधुन शोधुन मी मलई मेथी,बादशाही मेथी,लबाबदार मेथी,शाही मेथी कोफ्ता,

कश्मिरी मेथी रोल यासारखे अनेक पदार्थ खाल्ले असतील. 


छे ! 


स्टारवाल्या हाॕटेलात फक्त स्टारच असतात,पण मायेचा चंद्र नसतो,चांदणं नसतं !


दुधाचेही गुणधर्म वाढवायला कोजागिरीचा शीतल चंद्रच लागतो... चकाचाँद करणारे भगभगीत दिवे इथं काय कामाचे ? 


कोणत्याही पदार्थाला कसलीच चव नसतेच मुळी 

चव उत्पन्न होते ती करणा-याच्या मनातुन ! 


करणा-याचा भाव शुद्ध असला की कोणतीही अशुद्धी त्या पदार्थाला दुषित करत नाही !


संपुर्ण स्वच्छता पाळुन शिव्या देत केलेलं पंचपक्वान्नंही बाधतंच,पण कसलीही स्वच्छता न पाळता,मनाच्या गाभाऱ्यातनं जेव्हा माया,तेल आणि मिठात सोडली जाते तेव्हा मेथीची ती भाजीही अमृत होवुन जाते !


लोक याच मायाळु मावशीला हडळ म्हणायचे, का तर तीचा चेहरा भेसुर होता...


आपण चेहरा आणि कपड्यांवरुन माणसाबाबत आडाखे तयार करतो... ब-याच वेळा ते चुकतात. 


चेह-यावर रंग लावुन कलाकार मंडळी नाटक करतात,पण कोणताही रंग न लावता "नाटकं" करतात काही मंडळी,त्यांना काय म्हणावं ?


एखाद्याचं कौतुक करायला पट्कन शब्द सापडत नाहीत,भांडतांना मात्र झटपट त्यांना ते आठवतात.. याला काय म्हणायचं ? 


ज्यांना आपण आयुष्यंभर "चुकीची माणसं" समजत असतो,तेच आपल्याला कधीतरी "बरोबर अर्थ" समजावुन सांगतात... मग ते चुकीचे कसे काय ?दुस-याच्या चुका या चुका,पण आपल्या चुका म्हणजे "अनुभव" असं कौतुकानं सांगणाऱ्यांना काय म्हणावं ?  


असे दुटप्पीपणानं वागणारे लोकच मग एखाद्या व्यक्तीवर "हडळ" म्हणुन शिक्का मारतात !


एखाद्याला बहिष्कृत करतात...


या मावशीला मी गावाकडं गेल्यावर अधुन मधुन भेटायचो. 


मेडिकलच्या शेवटच्या वर्षाला असतांना एकदा भेटायला गेलो होतो.वय झालं होतं.खंगुन खाटेवर पडली होती.

आताशा तीला दिसत पण नव्हतं.... 


वयानुरुप चेहरा आणखी भेसुर झाला होता आणि आयुष्यं बेसुर ! 


जवळ कुणी जायचंच नाही.


मी भेटायला गेलो.स्मरणशक्ती ढासळलेली.तीनं ओळखलं नाही. शकाही आठवणी करुन दिल्या... मेथीच्या भाजीची आठवण सांगितली. 


मान वळवुन पुन्हा एकदा ती तशीच हसली, जशी मेथीची भाजी खायला घालतांना हसली होती पुर्वी... गुढ... गालातल्या गालात !


'काय आणुन देवु म्हातारे तुला ? ' मी हातात हात घेवुन प्रेमानं विचारलं. 


ठिगळ लावलेल्या,अंगावर चुकुन पडलंय असं वाटायला लावणाऱ्या लुगड्याकडं तीनं क्षीणपणानं बोट दाखवलं. 


'लुगडं...?' मी बरोबर ओळखलं. 


मी झट्दिशी उठलो,घरी जावुन माझ्या आजीची दोनचार लुगडी घेवुन येण्यासाठी...


तीने हातानंच खुण करत कुठं चाललास असं विचारलं.मी ही खुणेनंच सांगितलं, 'लुगडं घेवुन येतो...!' 


तीनं मला परत खुणेनंच जवळ बोलावलं...मी खाली वाकलो... 


ती कानाजवळ येवुन एकेक शब्द तोडत बोलली... 'जुनं तुज्या आज्जीचं लुगडं मला नगो, नव्वं कोरं आन... घडी मीच मोडनार... मरना-या मान्साला जुनं दिवु न्हाई काई... माज्या पोरानं मला नवं लुगडं आनलं,ह्येजातच माझा आनंद... ' हे बोलुन ती पुन्हा गुढ हसली... ! 


तीचं बोलणं ऐकुन मी शहारलो स्वतःच्या मरणाविषयी इतकी अलिप्तता ...? 


बरं तीनं कसं ओळखलं असेल ? मी जुनं लुगडं आणायला उठलोय,नवं नाही ते... ! 


मी विद्यार्थीदशेत... नवं लुगडं आणायला माझ्याकडं कुठले पैसे त्यावेळी ...? 


पण,पुढच्यावेळी आलो की घेवुन येईन असं सांगुन मी उठलो होतो. 


पुढं काही दिवसांनी डाॕक्टर झाल्यावर पुन्हा गावी गेलो.गाव चांगलंच सुधारलं होतं. 


म्हातारीचं घर मात्र पडुन गेलं होतं...पत्रे गंजले होते,ज्या खाटेवर ती झोपायची ती खाट तुटुन पडली होती एका कोप-यात लोळागोळा होवुन... गांव खरंच सुधारलं होतं !


शेजारी उभ्या असणा-या एकाला खुणेनं विचारलं,' म्हातारी कुठंय ?' 


तंबाखुची पिंक टाकत तो म्हणाला होता,'कोन ती हाडळ व्हंय ? आरं ती मेली की कवाच... कोन नव्हतं तीला...' 


पुढचं मला ऐकुच आलं नाही... ! 


कोण नव्हतं तीला ???


कसं सांगु... ? 


ती मेली नाही... माझ्या मनात ती कायम जीवंत आहे...! 


कोण कसं नव्हतं ? 

मनातुन तीनं मुलगा मानलं होतं मला ! 

आई होवुन ती गेली...! 

मलाच मुलगा होता आलं नाही... !!!


प्रत्येकवेळी आपलं मुल भेटत होतं,म्हणुन ती तशी गुढ हसली असेल का ? 


यानंतरही मी अनेकवेळा गावाला गेलो.पण गल्लीत फिरतांना हे पडकं घर मी टाळतो. 


मला भिती वाटते आणि लाजही ! 


फट्कन समोर येवुन ती नव्वं कोरं लुगडं मागेल ही भिती... आणि मी तीला ते कधी देवु शकलो नाही याची लाज ! 


डाॕक्टर झाल्यानंतर पैसे होते रग्गड माझ्याकडे... पण एक लुगडं घेण्याइतकाही मी श्रीमंत नव्हतो, त्या अर्थानं मी ही गरीबच की ! 


माणसाकडं पैसा असला की तो श्रीमंत होतो असं नाही...! 


या पैशानं जेव्हा कुणाचा दाह कमी होतो,वेदना कमी होतात,तेव्हा त्या पैशाची "लक्ष्मी" होते, नायतर नुसतेच तो कागद किंवा वाजणारी नाणी


खिशात लक्ष्मी असेल तो खरा श्रीमंत... बाकीचे नुसतेच धनिक ! नोटा आणि नाण्यांचे धनी !!!


तीच्या पडक्या घराला लोक हाडळीचं घर म्हणतात,मी त्याला आईचं स्मारक समजतो ! 


ती गेली... माझ्या डोक्यावर एका न पेलणा-या लुगड्याचं ओझं ठेवुन गेली... ! 


तीच्या घराजवळनं जातांना मी नजर चोरतो, एखादा देणेकरी असल्यासारखा... ! 


का कोण जाणे... त्या पडलेल्या घराकडं तरीही पाय वळतातच...


आणि उगीचंच भास होतो...तुटलेली ती जीर्ण खाट... माझ्याकडं बघत मंद मंद हसते आहे, गालातल्या गालात... तसंच गुढ... !!!


आणि मी पाय ओढत एकटाच  तिथुन चालायला लागतो, कुढत... कुणीच नसलेल्या एखाद्या बेवारशासारखा ... !!! 


डाॕ.अभिजीत सोनवणे,डाॕक्टर फाॕर बेगर्स

या जगात अजूनही अवलिया आहेत.अशाच अवलियांपैकी एक अवलिया या अवलियास त्याच्या महान कार्यास माझा सलाम..

२३/१०/२३

'कुब्र' जंगलाचा अनुभव देणारे पुस्तक.. A book introducing the 'Kubra' forest

सत्यजित पाटील यांचे कुब्र नावाचे पुस्तक बऱ्याच वेळा फेसबुक वर पाहण्यात आले  आणि माणिक पुरी सरांकडून ऐकण्यात आले होते.पुस्तकाचे मुखपृष्ठ पाहिले तेव्हापासून त्यावरील चित्र आणि विषय काय असेल याविषयी उत्सुकता लागली होती.सदरील पुस्तक माणिक पुरी सरांनी पाठवून दिले.काही दिवस पुस्तक हातात घेता आले नाही.पण डोळ्यासमोरून चित्र आणि विषय बाजूलाही सारता आला नाही.शेवटी पुस्तक उत्सुकतेने वाचायला सुरुवात केली.अतुल देऊळगावकर सरांच्या अभ्यासपूर्ण प्रस्तावनेच्या सुरुवातीला फ्रेड्रिक नित्शे यांचं ' परमेश्वराचा मृत्यू झाला आहे'  हे वाक्य वाचून विचारात पडलो. पुस्तक वाचत  शेवटाकडे जाताना या सृष्टीला जगवणारा ,वाचवणारा कोण आहे..? खरा परमेश्वर कोण आहे...? हे स्पष्ट होतं आणि तो म्हणजे मला निसर्ग वाटतो.याचा पालनकर्ता निसर्गाचा ऱ्हास करणारा कोण...? हे पण स्पष्ट होतं तेव्हा फ्रेड्रिक नित्शे यांच्या वाक्याचं प्रयोजन कळू लागतं.आणि या निसर्गाचा म्हणजेच परमेश्वराचा खून करणारा माणूस असल्याची जाणीव होते.प्रस्तावना वाचल्यानंतर पुस्तकाविषयीचे आकर्षण अधिकच वाढू लागले. प्रस्तावनेतून पुस्तकाच्या विषयांमध्ये घुसण्याचा मार्ग सहज आणि सोपा झाला.

'कुब्र' म्हणजे काय.. हे समजायला लागले.सत्यजित पाटील यांनी ताडोबाचे पंच ज्ञानेंद्रियाद्वारे केलेलं अरण्यवाचन,निरीक्षण,समजून घेतलेल्या सूक्ष्म नोंदीचा समावेश कुब्रमध्ये  केला आहे.सत्यजित पाटील यांनी केलेल्या सूक्ष्म निरीक्षणामुळे त्यातील सत्यता वर्णनातून दिसून येते. 


जंगल पाहत फिरत असताना त्यांनी काळ -वेळ, साथ- संगत पाहिलेली नाही.जंगल म्हणजे त्यांचा श्वास असल्याची अनुभूती कुब्रमधील वर्णन वाचताना होते.ते एका ठिकाणी म्हणतात की 'घड्याळाला चिकटून असलेलं चित्त मुक्त असू शकत नाही.' म्हणून ते घड्याळ सुद्धा सहसा वापरताना दिसून येत नाहीत..इतकच नाही तर जंगल वाचन करत असताना जंगलात कॅमेरा न वापरता मनाच्या स्मृती पटलात सर्व नोंदी जशाच्या -तशा टिपून घेतात.हे पाहून त्यांचं खूप कौतुक करावंसं वाटतं.


कुब्रमध्ये वेगवेगळ्या प्रकरणाला दिलेली नावं खूप छान आहेत.त्यावरून त्या प्रकरणात काय असेल याची उत्सुकता लागून राहते.यातील प्रसंगाच्या नोंदी वाचताना लेखकांनी निरीक्षणाच्या वेळी दाखवलेला संयम,केलेले धाडस,क्षणांची आतुरतेने पाहिलेली वाट, यासाठी धरलेला धीर या सगळ्या गोष्टी अलौकिक आणि थक्क करणाऱ्या वाटतात.या नोंदीची काही उदाहरणं आपण पाहूयात म्हणजे त्यांनी निरीक्षणासाठी  केलेले धाडस आपल्याला दिसून येईल...


जंगलातून फिरत असताना आपण एखाद्या प्राण्यांना पाहण्यासाठी जात असतो.परंतु त्याचवेळी एखादा प्राणी सुद्धा आपल्याला पाहत असतो.अशावेळी आपण कानांची दृष्टी करून दूरचे पाहण्याचा प्रयत्न केला पाहिजे.   नाहीतर आपल्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.बऱ्याच वेळा इतर प्राण्यांच्या वर्तन आणि आवाजावरून काही प्राण्यांची चाहूल लागते.थोडक्यात वाघाची चाहूल लागल्यावर सावध करण्यासाठी कोतवाल हा पक्षी अधिक विश्वसनीय असल्याची त्यांनी नोंद केलेली आहे.कोतवाल हा पक्षी दोन किलोमीटर अंतरावर वाघ असतानाच विशिष्ट आवाजाद्वारे सावधानतेचा इशारा देऊन टाकतो. याबाबतीत मोर ही इशारा देतो.परंतु मोराचा अंदाज एवढा अचूक असेल याची खात्री नाही ही त्यांनी अनुभवांती केलेली नोंद आहे. 


जंगल म्हणजे नैसर्गिक साधन संपत्तीचा खजिना असलेली खाण असते.या ठिकाणी खूप मोठी जीवसृष्टी वाढत असते,राहत असते.परंतु या ठिकाणी बऱ्याच वेळा माणसांच्या चुकीमुळे किंवा नैसर्गिक कारणामुळे आग लागून वणवा पसरतो आणि अनेक जीवजंतू,वनस्पती,

प्राणी, पक्षी नष्ट होऊन जातात.जे नुकसान कधीही भरून निघू शकत नाही.हे नुकसान टाळण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जातात.यामध्ये फायर लाईन (जाळ रेषा) तयार केल्या जातात .या फायर लाईनमुळे आग एका विशिष्ट टप्प्यापर्यंतच जाऊ शकते आणि पुढे नियंत्रणात आणण्याची शक्यता वाढवता येते . फायर लाईनच्या जागेवर उठणाऱ्या गवताचे त्यांचे निरीक्षण मला खूप महत्त्वाचं वाटतं . फायर लाईन केल्या नंतर तेथील गवत उन्हाळ्यात दरवर्षी जाळलं जातं.परंतु या फायर लाईनवर पावसाळ्यात नव्याने एकाच जातीचं सर्वत्र गवत उगव लेल दिसतं. हे गवत कुळात असलेल्या बियांचे गवत असतं.ही कुसळं  अग्नीरोधक असतात.यामुळे कुसळातील बियांचं आगीपासून संरक्षण होतं.बाकीचं सर्व गवत बियासगट जळून जाते आणि उरतं ते फक्त कुसळाचं बीज.जे पाऊस आल्यानंतर पुन्हा फायर लाईन दरम्यान उगवतं आणि आख्खी फायर लाईन या कुसळाच्याच गवताने भरून जाताना दिसून येते.इतकं बारकाईचं निरीक्षण या ठिकाणी दिसून येतं. 'जो तगतो तोच जगतो' हा सिद्धांत या ठिकाणी आठवतो.गवताच्या बाबतीतली इतकी बारकाईची नोंद मी यापूर्वी कुठेही वाचली नव्हती.ही मला खूप नवलईची आणि महत्त्वाची गोष्ट वाटते.


जंगल भ्रमंती दरम्यान त्यांना काही प्राण्यांमधील दिसून आलेली साहचर्याची नोंद या पुस्तकामध्ये आढळून येते.

अनेक प्राणी एकमेकांच्या संगतीने राहतात,विविध माध्यमातून सहकार्य करताना दिसून येतात.चितळ,हरीण आणि लंगूर नेहमीच एकत्र दिसतात.कारण लंगूर झाडावर राहतात आणि त्यामुळे वाघ किंवा शिकारी प्राणी येत असल्याची सूचना ते विशिष्ट आवाजातून चितळांना देत असावेत म्हणून ते सोबत राहत असावेत.ही सहकार्याची वृत्ती मानवांमध्ये वाढत गेली तर आज समाजात दिसून येणारी तेढ, वादविवाद कमी होण्यास खूप मदत होईल असे वाटते.


जंगल निरीक्षण करत असताना आपण फार सावधगिरीने जंगल पाहिलं पाहिजे.जंगलाचा आणि जंगलातील प्राण्यांचा सन्मान केला पाहिजे.त्यांच्या घरात जाऊन आपल्याकडून चुकीची कृती घडता कामा नये.कारण ते आपल्यापेक्षा अधिक संवेदनशील असतात. म्हणून जनावरांना आपले अस्तित्व आधीच कळत असतं.त्यामुळेच ते आपल्याला टाळून दुसरी वाट निवडतात.माणसांना टाळणं ही प्राण्यांची पहिली प्रतिक्रिया असते.असं सत्यजित पाटील यांनी निरीक्षणाअंती मांडलेलं मत आहे. 


हे मला खरं वाटतं.प्राण्याची भाषा,तरंग संवेदनावर आधारित असतात.आपले तरंग प्राणी ओळखतात आणि बऱ्याचदा आपल्याला वाट मोकळी करून देतात.म्हणून आपण पुन्हा - पुन्हा त्यांच्या वाटेवर जाणे बरे नाही.

जंगलातील मोठ्या प्राण्यांबरोबर अगदी छोटे प्राणी सुद्धा महत्त्वाचे असतात.याची नोंद सत्यजित पाटलांनी घेतलेली दिसून येते.कीटक वर्गातील पिंपळ माशी ची नोंद महत्वपूर्ण वाटते.अशा नोंदी मुळातून वाचल्या पाहिजेत.पिंपळमाशा किंवा यासारख्या छोट्या - छोट्या माशा नष्ट झाल्या तर मोठ-मोठे वृक्ष नष्ट होतील.

वातावरणाच्या एकंदर तापमानात सतत वाढ होत राहिली तर पिंपळमाशीच्या आयुष्य काळावर परिणाम होऊ शकतो आणि यामुळे जंगलाचं अस्तित्व धोक्यात येऊ शकतं.

   

या पुस्तकातील चक्करघीनी हा लेख अत्यंत महत्त्वपूर्ण वाटतो.या लेखातून लेखकाची जीवन -मृत्यू कडे बघण्याची दृष्टी दिसून येते . चक्करघीनी म्हणजेच जीवाच्या सृजनापासून ते देहाच्या विसर्जनापर्यंत होणारी प्रक्रिया या लेखांमध्ये मांडलेली आहे निसर्गाच्या  चक्करघीनीत कोणीही लहान किंवा मोठा नाही , कोणी कमी महत्त्वाचा किंवा अति महत्त्वाचा असेही नाही.पण यातल्या एकाचेही अस्तित्व नष्ट होणं म्हणजे कालांतराने कदाचित काही लाख वर्षांनी या चाकाला खीळ बसणं होय आणि हे सृष्टीला परवडणार नाही.अगदी मधमाशी सुद्धा त्यांच्या नजरेतून सुटलेली नाही.मधमाशीच्या नोंदी खूप महत्त्वाच्या वाटतात.मोहोळाचं पोळ असतं त्या पोळ्यातील कांदा नेमका कोणत्या ठिकाणी असतो याची नोंद खूप महत्त्वाची वाटते.मधमाशांच प्रजनन कसं होतं…? कामगार किंवा सैनिक माशा किती जन्माला याव्यात?


राणी माशा किती तयार झाल्या पाहिजेत?याचं सुद्धा नियोजन मधमाशा करत असतात. कीटकांना सुद्धा संवेदना,स्मृति असते.ते चेहरे लक्षात ठेवत असल्याची माहिती या लेखातून मिळाली.एखाद्या पोळ्यात दोन किंवा तीन राणी माशा जन्माला आल्या तर काही काळानंतर त्या राणीमाशी काही नरांना घेऊन नव्याने पोळ निर्माण करतात.ही मधमाशांमधील कुटुंबाची सामाजिकता अत्यंत महत्त्वाची वाटू लागते.ही गोष्ट माणसांनी स्वीकारली असावी म्हणून तर मोठे कुटुंब झालं की काही दिवसांनी त्या कुटुंबाचे वेगवेगळे कुटुंब झालेले दिसून येतात.


प्रत्येक जीव आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या कृती करत असतो आणि अस्तित्व टिकवतो.

आपल्या घरात दिसणाऱ्या पालीवर काही अटॅक झाला तर ती शेपूट तोडून पळून जाते.त्याच पद्धतीने गडद तपकिरी रंगाची गांडूळ लेखकांना एक वेळा दिसली.

गांडूळ हातात घेण्याचा प्रयत्न केला त्यावेळी हातात धरलेला भाग तेवढाच गांडूळानी तोडून टाकला आणि उर्वरित गांडूळ लपून बसण्याचा प्रयत्न करताना दिसून आले.हे वाचताना 'सर सलामत तो पगडी पचास' ही म्हण आठवते.प्राणी खूप हुशार असतात.त्यांची प्रत्येक कृती ही अनुभवातून आलेली असते.त्यामागे त्यांच्या अनेक पिढीचे चिंतन असतं असं वाटतं. प्राण्यांमधील हुशारपणा जाणून घेतल्यानंतर माणसातील शहाणपणाच्या मर्यादा सुद्धा हळू-हळू लक्षात येऊ लागतात.जंगलात त्यांना दीप्तीवान म्हणजे चमकणारी गोम दिसली. निरीक्षणाअंती त्यांच्या असं लक्षात आलं की त्यांच्या शरीरात एक रसायन असतं.ते विकर हवेच्या संपर्कात आलं आणि  प्राणवायुशी विकराचा संयोग झाला की ते प्रकाशतं आणि त्यातून हिरवा,निळसर,थोडा पांढरा प्रकाश दिसू लागतो.

यामुळे प्राण्यावर हल्ला करणारा प्राणी गोंधळून जातो आणि दीप्तीवान गोमीचा जीव वाचतो.प्रत्येक जीवाला आपला जीव कशा पद्धतीने वाचवला पाहिजे याची सर्व सोय निसर्गाने उपलब्ध करून दिलेली आहे,फक्त त्याचा योग्य वेळी वापर करता आला पाहिजे हे या दीप्तीवान गोमीला वाचताना कळून आले.


माणसाप्रमाणे प्राणी सुद्धा आजारी पडतात. त्यावेळी ते निसर्गातीलच वनस्पतींचा उपयोग करतात.वटवाघळे पोट दुखू लागली तर बेहडाचे देठाकडचे पाने खाताना दिसून येतात.लंगुर वानर करंजीचे पानं खात असताना शेंड्याकडील टोकाकडीलच पानाचा भाग खातात.कारण पानाच्या वरील भागात अलकाईड नावाचं रसायन असतं आणि हे रसायन आरोग्याला घातक असल्यामुळे ते पानाचा टोकाकडील भाग खातात,इतकच नव्हे तर वाघासारखा प्राणी शिकार केल्यानंतर शिकार केलेल्या प्राण्याचा आतड्याचा भाग आधी दूर नेऊन फेकून देतो.तो भाग खाण्याचं टाळतो.यामुळे ती शिकार दोन ते तीन दिवस व्यवस्थित रित्या टिकून राहते. प्राण्यांमधील हे शहाणपण माणसाला घेता आलं तर माणसांचं सुद्धा आरोग्य चांगले राहू शकते. अन्न कसं आणि किती खाल्लं पाहिजे या गोष्टी सुद्धा प्राण्यांकडून शिकण्यासारख्या आहेत.


अणूवृक्ष संदर्भातील लेख मुळातून वाचण्यासारखा आहे.अणूवृक्ष म्हणजे करोडो जिवाणू एकत्र येऊन बनलेलं एक सूक्ष्म झाड असतं.सेंद्रिय पदार्थ कुजण्याच्या जागी हे हमखास आपणास आढळून येत. यासंदर्भातील निरीक्षण अत्यंत अभ्यासपूर्ण आहेत.


प्राण्यांमधील समन्वय,साहचर्य आणि कळपाची एकता ही वाखण्यासारखी आहे.आकाराने आणि शक्तीने लहान प्राणी कितीतरी मोठ्या असणाऱ्या प्राण्यांची सहजरीत्या शिकार करू शकतात,  कारण त्यांच्यात असलेली संघभावना आणि आपल्या कळपाविषयी असलेली निष्ठा महत्त्वाची असते.रान कुत्रे कळपाने राहून मोठ्या -मोठ्या सांबराची सहजरित्या शिकार करतात. जेव्हा सांबरच्या पिल्लाची शिकार होते तेव्हा शिकार झालेल्या पिल्ल्याच्या आईची मनस्थिती वाचताना आपलंही मन  गलबलून जाते.पण हा निसर्गाचा नियम आहे.कळपाचे नैसर्गिक सावधपण हे भीतीतून जन्माला येत नाही तर तो एक सहज भाव असतो. याउलट माणूस जंगलात वावरतो तो भीतीचा पूर्वग्रह सोबत घेऊन.माणसाचं सावधपण हे नैसर्गिक नसतं आणि म्हणून जंगलात वावरताना माणसाच्या मनाला सतत भीतीचे दंश होत राहतात.


कोळ्यांचे शहाणपण हे खूप विशेष वाटलं. कोळी जाळे विणून कीटकांची शिकार करून खात असतात.यातील काही कोळी हे दिवसा जाळं पडद्याप्रमाणे गुंडाळून ठेवतात आणि रात्रीला ते जाळं सोडून त्यात कीटकांना अडकवतात.त्यांच्यातील संवेदनशीलता खूप महत्त्वाची आणि हुशारपणाची वाटली.एखाद्या भुसभुशीत ठिकाणी गोल छोट्या आकाराचा खड्डा केलेला असतो.त्यामध्ये सुद्धा कोळी राहतात हे नव्याने कळाले.आम्ही त्याला लहानपणी  हल्ल्या असं म्हणत होतो.त्यात मुंगी वगैरे टाकली तर ते खाण्यासाठी तो हल्ल्या वर यायचा त्यालाच ' सिंहमुंगी 'म्हणतात असे यातून कळाले. कोळ्यांची संवेदनशीलता ही खूप महत्त्वाची वाटत.ती अतिशय नाजूक स्पंदन सुद्धा ओळखतात.


प्राणी त्यांच्यातील शहाणपण सृष्टीतील अन्य घटकांचे अहित करण्यासाठी वापरत नाहीत. त्यांच्या शहाणपणाच्या कृतीने निसर्गचक्रात समतोलपणा राहतो.याउलट माणसाचा शहाणपणा स्वतःसहित सगळ्यांचे अहित आणि सृष्टीचा विध्वंस करणारे आहे. जंगलातील साधन संपत्तीचे म्हणजे झाडांची आणि प्राण्यांची शिकार करण्यासाठी माणूस आपला शहाणपणा अतिरेकापर्यंत जाऊन वापरतो. याचा परिणाम जंगलाचा सौंदर्य आणि जंगलाचा प्राण संपण्यावर होतो.जंगलातील झाड ही त्या जंगलाचा श्वास असतात.प्राण्यांचा निवारा असतात.ती झाडं कापण्यासाठी माणसं अनेक प्रकारचे उपाय करत असतात.यातील कंपनघागर हे प्रकरण खूप मनाला विचार करायला लावते.


जंगलातील वृक्ष तोडत असताना तोडण्याच्या साधनांचा कुऱ्हाडीचा आवाज दूरपर्यंत जाऊन वनरक्षकांना कळू नये म्हणून त्या ठिकाणी वृक्षातोड करणारे लोक एक पाण्याची घागर भरून ठेवतात ,कारण झाड तोडताना होणाऱ्या आवाजाची कंपने ही घागर शोषून घेते आणि कुऱ्हाडीचा आवाज दूरपर्यंत जात नाही.


 ही गंभीर बाब लेखकाच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी केलेली कार्यवाही खूप धाडसी वाटू लागते.माणसाचा शहाणपणा हा कोणाच्या हिताचा आहे …हा प्रश्नही निर्माण होतो.शहराची भूक भागवण्यासाठी सागवानाची सर्रासपणे कत्तल केली जाते हे खूप घातक आहे.हे कुठेतरी थांबायला हवे.


हिरवा वनवा हे प्रकरण खूप महत्त्वाचे आहे. नाव वाचल्याबरोबर वाचकाचे मन आकर्षित होते. जंगलात भारतीय वनस्पती बरोबर काही परकीय वनस्पती अतिशय वेगाने वाढत आहेत. या परकीय वनस्पतींना नष्ट करणारे कीटक या ठिकाणी नसल्यामुळे त्या फोफावत आहेत. यामुळे भारतीय मूळ वनस्पती आणि गवताचे अस्तित्व धोक्यात येताना दिसत आहे . थोडक्यात आपल्या भागात सर्रासपणे वाढणारी टणटणी किंवा घाणेरी नावाची वनस्पती अति वेगाने वाढत असताना भारतीय वनस्पती आणि गवतांना पाठवून गळपाटून टाकत आहे . यासोबतच भूतगांजा सारखी वनस्पती सुद्धा भारतीय रानगवतांचा प्राण घेत आहे . तृणगवतावर जगणाऱ्या प्राण्यांना याचे परिणाम भोगावे लागत आहेत.

या वनस्पती नष्ट करण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजनांची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे.या गोष्टीकडे सुद्धा लेखकाने आपले लक्ष वेधलेले आहे.अशा हिरव्यागार वनस्पती अतिशय वेगाने वाढत आहेत.ज्या पर्यावरणाला घातक आहेत.यालाच लेखकाने 'हिरवा वनवा' ही दिलेली उपमा अतिशय समर्थक आणि योग्य वाटू लागते.


जंगलावर या ना त्या प्रकारे सतत आक्रमण सुरू असतं.हे कुठेतरी थांबायला हवे नाहीतर हे जंगल नष्ट व्हायला आणि सृष्टी भस्म व्हायला वेळ लागणार नाही.डॉ.सलीम अली एका ठिकाणी म्हणतात की " मानव जात नाहीशी झाली तर या वनस्पती,पक्षी, प्राणी यांचे काही बिघडणार नाही पण ही जीवसृष्टी नष्ट झाली तर मानवजात मात्र जगू शकणार नाही ." हे मानवांनी आता शिकलं पाहिजे पुढच्या पिढींना आपण काय देणार आहोत? यावर विचार केला पाहिजे.पर्यावरण समृद्ध करण्यासाठी या प्राण्यांकडून आपल्याला काही शिकता येईल का? याचा विचार केला पाहिजे कारण या सृष्टीतील वनस्पती,प्राणी यांचं अस्तित्व असेपर्यंत आणि त्यांचे अस्तित्व नष्ट झाल्यानंतर ते या पर्यावरणासाठी पोषक असतात. वनस्पतीची वाळून गेलेली लाकडं ही जंगलातच राहिली तर पावसाच्या पाण्याने ती कुजून मातीत मिसळून जातात,त्यामुळे ती माती समृद्ध होते.समृद्ध झालेल्या मातीत अनेक वनस्पती जिवाणू तयार होतील. जी जंगल समृद्ध करणारी असतील.माणसाचं मात्र असं नाही माणूस जंगलाला खायला उठलेला आहे . जंगल समृद्ध करण्यासाठी वनस्पती प्राणी जीवन वाढवतात म्हणून तरी माणसाने त्यांच्या मनातील निसर्ग उद्ध्वस्त करणारे विषाणू मारून टाकावेत.हा विचार हे कुब्र वाचल्यानंतर वाचकाच्या मनात निर्माण होतो.( कुब्र लेखक सत्यजीत पाटील,प्रकाशन - शब्दालय)


कुब्रमध्ये तिन्ही ऋतूंचं वर्णन केलेले आहे.प्रत्येक ऋतूचे वर्णन वेगवेगळ्या प्रकरणात अनुभव मांडले आहेत.हे वर्णन लेखकाने आपल्या तन-मन-धन आणि जंगलावरील निष्ठेपायी केले आहे.यासाठी त्यांनी केलेले धाडस आणि संयमाने केलेले निरीक्षण याची खरोखर कमाल करावी वाटते वाक्यरचना करताना क्रियापदांचा काही ठिकाणी वापर नसल्याने वाक्य तोडल्यासारखी वाटतात.तरीही वाचनाची आतुरता मात्र कायम राहते.

    

अतुल देऊळगावकर यांची प्रस्तावना आणि वसंत आबाजी डहाके यांनी केलेली पाठ राखण आणि पुस्तकातील लेखकांचे निरीक्षण अनुभव यामुळे हे पुस्तक अतिशय सुंदर झाले आहे वाचकाच्या मनात जंगला विषयी प्रेम आणि डोळ्याला जंगलाकडे पाहण्याची दृष्टी देणारे आहे.


आवडते शिक्षक,भरपुर वाचन करणारे आमचेही मार्गदर्शक मित्र माधव गव्हाणे (सॉक्रेटिस ) यांनी केलेले पुस्तक परीक्षण


स्वतःसाठी एक झोपडी बांध आणि जिवंत असतानाच स्वतःची चिरफाड करण्याची प्रक्रिया सुरू कर...! एमर्सन एकदा हेन्री डेव्हिड थोरोला म्हणाला होता.


माधव गव्हाणे यांनी केलेली ही 'स्व' ची चिकित्साच आहे.



२१/१०/२३

'स्तुती' भोजनासारखीच गरजेची आहे. 'Praise' is as necessary as food.'

" एका खेडुत स्त्रीने दिवसभर काबाडकष्ट करून आपल्या परिवारासमोर जेवणाऐवजी लाकडाचा भुसा ठेवून दिला.

जेव्हा पती व मुलांनी या अजब प्रकाराचे कारण विचारले,तेव्हा त्या स्त्रीने उत्तर दिले,"मला वाटलं की तुमचं लक्ष याकडे जातच नाही की तुमच्यासमोर जेवण ठेवलं जातं की भुसा.गेली वीस वर्षे मी तुम्हा लोकांसाठी जेवण बनवते आहे पण तुम्ही मला कधी सांगितलं नाही की तुम्ही भुसा खात आहात."


घरातून पळून गेलेल्या महिलांबाबत काही काळापूर्वी संशोधन झाले.पळून जाण्यामागचे कारण होते 'प्रशंसेचा अभाव' आणि मी पैज लावतो,की हेच कारण घरातून पळून जाणाऱ्या नवऱ्यांचेही असणार!आम्ही बहुतेक वेळा आपल्या जोडीदाराला हे सांगायची तसदीच घेत नाही की आम्ही त्याच्या/तिच्यामुळे प्रभावित आहोत म्हणून.


माझ्या वर्गात एका सदस्याने आपल्या जीवनातली एक घटना ऐकवली ज्यामध्ये त्याच्या पत्नीने त्याच्यापाशी एक आग्रह धरला होता.त्याची पत्नी व अन्य महिला चर्चमध्ये एका आत्मसुधार कार्यक्रमात सामील झाल्या.एक दिवस त्याच्या पत्नीने त्याला तिच्यातले सहा दोष काढायला सांगितले,जे सुधारल्याने ती अधिक चांगली पत्नी होऊ शकेल.तिचा पती हे ऐकून हैराण झाला.तो म्हणाला..

"पत्नीच्या अशा आग्रहाने मी आचंबित झालो.खरे पाहिले तर मी सहज तिच्या हातात तिच्यातल्या दोषांची यादी देऊ शकलो असतो,ज्यामध्ये सुधारणेची गरज होती.ईश्वर जाणतो की तीसुध्दा अशा हजार गोष्टींची यादी माझ्या हातात देऊ शकली असती ज्यांमध्ये मला सुधारणेची आवश्यकता होती; पण मी असे केले नाही.मी तिला म्हटलं,"मला याबाबत विचार करायला वेळ दे.मी उद्या सकाळी तुला याचे उत्तर देईन.'


दुसऱ्या दिवशी सकाळी मी लवकर उठलो आणि फुलवाल्याला फोन करून माझ्या पत्नीसाठी सहा गुलाबांच्या फुलांचा नजराणा पाठवायला सांगितला.सोबत एक चिठ्ठी होती,"मला तुझे सहा दोष माहीत नाहीत,जे सुधारण्याची गरज आहे.तू जशी आहेस तशीच मला फार आवडतेस."


त्या संध्याकाळी जेव्हा मी घरी परतलो तेव्हा तुम्ही सांगू शकाल का की दरवाजात माझं स्वागत कुणी केलं?अगदी बरोबर!माझ्या पत्नीने!तिच्या डोळ्यांत अश्रू भरले होते.हे

सांगण्याची आता आवश्यकता नाही की मी या गोष्टीवर अत्यंत खुश होतो.पुढच्या रविवारी चर्चमध्ये इतर स्त्रियांना तिने ही घटना सांगितली आणि अनेक स्त्रियांनी मला येऊन सांगितले,की इतकी शहाणपणाची गोष्ट आम्ही या आधी कधीच ऐकली नव्हती.तेव्हा कुठे मला स्तुती करण्याच्या शक्तीचा प्रत्यय आला.'


लॉरेंस जिगफेल्ड ऑडवेअर धूम माजवणारा सुप्रसिध्द निर्माता होता.तो एक असा निर्माता होता,

ज्याच्यात 'अमेरिकन तरुणींना ग्लॅमरस' बनवण्याची विलक्षण प्रतिभा होती.प्रत्येक वेळी ते अशा एखाद्या सामान्य तरुणीला निवडत असे, जिच्याकडे कुणी पुन्हा वळूनसुध्दा पाहणार नाही.मग ते तिच्यात कायापालट करीत.प्रशंसा व आत्मविश्वासाचे महत्त्व जाणवल्यामुळे त्यांना माहिती होते की केवळ प्रशंसा व महत्त्व दिल्याने सामान्य स्त्रीसुद्धा स्वतःला सुंदर मानू लागते.ते व्यवहारी होते.त्यांनी कोरसमध्ये गाणाऱ्या मुलींचा पगार आठवड्याला तीस डॉलरपासून वाढवून ७५ डॉलर्स केला.

ते विशाल अंतःकरणाचे होते.फॅडलीजच्या सादरीकरणाच्या पहिल्या रात्री त्यांनी सर्व कलाकारांना तार पाठवली आणि यामध्ये काम करणाऱ्या प्रत्येक मुलीला अमेरिकन ब्यूटी गुलाब दिले..


एकदा माझ्यावर डाएटिंगचे भूत सवार झाले अन् मी सहा दिवस उपास केला.सहाव्या दिवशी मला तेवढी भूक लागत नव्हती,जेवढी दुसऱ्या दिवशी लागली होती.आम्ही सगळेच हे जाणतो की जर एखाद्याच्या परिवाराला किंवा कर्मचाऱ्यांना सहा दिवस खायला मिळाले नाही तर तो स्वतःला अपराधी मानेल.पण जर ही व्यक्ती परिवार किंवा कर्मचाऱ्यांची स्तुती सहा दिवस,सहा आठवडे किंवा साठ वर्षापर्यंत करणार नाही,तेव्हा त्याला जरासुध्दा अपराधी वाटणार नाही.आम्ही हे विसरतो की स्तुतीसुद्धा भोजनासारखीच आमची अनिवार्य गरज आहे.


जेव्हा महान अभिनेता अल्फ्रेड लुटने 'रियुनियन इन व्हिएन्ना' मध्ये प्रमुख भूमिका केली,तेव्हा त्यांनी म्हटले होते,


" मला ज्या गोष्टीची सर्वाधिक गरज आहे ती आहे - आत्मसन्मानासाठीचं पोषण."


आम्ही आपली मुले,मित्र आणि कर्मचाऱ्यांच्या शरीराचं पोषण करतो;पण आम्ही त्यांच्या आत्मसन्मानाचं किती पोषण करतो ?आम्ही त्यांना उर्जेसाठी मांस व बटाटे उपलब्ध करून देतो,पण आम्ही त्यांना प्रशंसेचे दयाळू शब्द द्यायला विसरुन जातो,जे वर्षानुवर्ष त्यांच्या आठवणीत पहाटेच्या ताऱ्यांच्या संगीतासारखे गुंजेल.


पॉल हार्वेने आपल्या 'द रेस्ट ऑफ द स्टोरी' या रेडियो कार्यक्रमात सांगितले,की कशा तऱ्हेने खरी प्रशंसा एखाद्या व्यक्तीचे जीवन बदलून टाकते.त्यांनी एक घटना ऐकवली.अनेक वर्षांपूर्वी डेट्रॉइटच्या एका शिक्षिकेने स्टेव्ही मॉरिसला म्हटले की हरवलेल्या एका उंदराचा शोध घ्यायला त्याने मदत करावी.निसर्गाने स्टेव्हीला डोळे दिले नसतील.पण त्या ऐवजी स्टेव्हीची श्रवणशक्ती अतिशय तेज होती. स्टेव्हीमध्ये असे काही होते,जे त्या पूर्ण वर्गात कुणापाशीच नव्हते.पण हे असे प्रथमच घडले होते की त्याच्या श्रवणशक्तीसाठी कुणी त्याची प्रशंसा केली होती.

अनेक वर्षांनंतर स्टेव्हीचे म्हणणे आहे की ती प्रशंसा त्यांच्या नवीन जीवनाची सुरुवात होती.त्या घटनेनंतर त्यांनी आपल्या ऐकण्याच्या क्षमतेचा विकास केला आणि स्टेव्ही वंडरच्या रंगमंचीय नावाला स्विकारून ते सत्तरच्या दशकाचे महान पॉप सिंगर व गीतकार झाले.


अनेक वाचक या शब्दांना वाचताना मनात म्हणतील 'अच्छा! लबाडी ! लांगूलचालन ! मी याचा उपयोग करून पाहिला आहे समजदार लोकांसमोर.पण हे प्रकार चालत नाहीत. '


अगदी बरोबर आहे ! लबाडी शहाण्या लोकांसमोर चालत नाही.ती उथळ,स्वार्थी आणि खोटी असते.तिला असफल व्हायलाच हवे आणि ती असफल होतेच. 


तसे तर अनेक लोक प्रशंसेचे इतके भुकेले असतात की ते लबाडीला स्तुती समजून पचवून टाकतात,ज्याप्रमाणे एखादा भुकेलेला मनुष्य गवत व किडे-मुंगळे खाऊन टाकतो.


महाराणी व्हिक्टोरियालापण खोटी स्तुती आवडत असे.प्रधानमंत्री बेंजामिन डिस्त्राइलीने हे स्विकार केले होते,की ते महाराणीची खोटी स्तुती करतात.त्यांच्याच शब्दात सांगायचं तर 'ते मोठ्या चमच्याने लोणी लावत असतात.'परंतु डिस्त्राइली ब्रिटनचे सर्वांत सुसंस्कृत,योग्य व चतुर व्यक्ती होते.ते या कलेत निपुण होते.जी गोष्ट त्यांचा हेतू सफल करून गेली,ती तुमच्या आमच्यासाठी योग्य ठरेलच असे काही म्हणता येणार नाही. दीर्घ काळासाठी खोटी स्तुती करण्याने फायदा कमी अन् तोटाच जास्त होऊ शकतो.अशी खोटी स्तुती म्हणजे खोटा शिक्का आहे.जर तुम्ही त्याला खरा शिक्का म्हणून बाजारात चालवण्याचा प्रयत्न केलात तर ते अंगाशी येऊ शकते.तुमच्या प्रशंसा व खोटी स्तुती यात काय फरक आहे ? याचे उत्तर अगदी सोपे आहे.एक खरी असते आणि दुसरी खोटी. एक हृदयातून निघते आणि एक स्वार्थातून.एक निस्वार्थी असते,तर दुसरी स्वार्थपूर्ण ! एकीची प्रत्येक ठिकाणी स्तुती होते तर दुसरीची हर ठिकाणी निंदा.


मी मेक्सिको शहरात हल्लीच चापुल्टेपेक पॅलेसमध्ये एक मेक्सिकन हिरो जनरल अल्वारो ऑब्रेगॉनची मूर्ती बघितली.त्या मूर्तीखाली 


जनरल ऑब्रेगॉनच्या तत्त्वज्ञानाचे बुध्दिमत्तापूर्ण शब्द लिहिले होते : "आपल्यावर हल्ला करणाऱ्या शत्रुंना घाबरू नका;उलट त्या मित्रांना घाबरून असा जे तुमची खोटी स्तुती करतात. '


नाही,नाही,नाही!मी तुम्हाला खोटी स्तुती व लबाडी करायला सांगत नाहीए.मी तर अगदी वेगळेच सांगतोय.मी तुम्हाला एक नवीन जीवन सुरू करायला सांगतोय.मला परत सांगू द्या.'मी तुम्हाला एक नवीन जीवन सुरू करायला सांगतोय.'


सम्राट पंचम जॉर्जने बकिंगहॅम राजवाड्यात आपल्या एक अभ्यासिकेच्या भिंतीवर सहा सूत्रे लिहून ठेवली होती.त्यातले एक सूत्र असे होते, 


"मला हे शिकवा की ना मी कुणाची खोटी स्तुती करेन आणि ना कुणाकडून स्वतःची खोटी स्तुती ऐकण्यासाठी उत्सुक राहीन."


 मी एकदा लबाडीची व्याख्या वाचली होती जी इथे सांगण्यासारखी आहे- 


"लबाडी किंवा खोटी स्तुती समोरच्याला तेच सांगते जो तो स्वत:बद्दल विचार करतो."


"तुम्ही जी वाटेल ती भाषा वापरा,"राल्फ वॉल्डो इमर्सनने म्हटले होते,"तुम्ही नेहमी तेच सांगाल जे तुम्ही आहात.'


जर आम्हाला फक्त लबाडीच करायची असेल तर सर्वांशी लबाडीने वागून आम्ही सहजपणे मानवी संबंधाचे विशेषज्ञ बन् शकतो.


जेव्हा आम्ही कुठल्याच निश्चित विषयाबद्दल विचार करीत नसतो,तेव्हा आपल्या फावल्या वेळात ९५ टक्के वेळ आम्ही स्वत:बद्दलच विचार करीत असतो.जर आम्ही स्वत:बद्दल विचार करणे थोडे कमी केले तर दुसऱ्यांच्या चांगल्या गुणांबद्दल विचार करायला लागू,तेव्हा मग आम्हाला लबाडीची किंवा खोटी स्तुती करण्याची गरजच वाटणार नाही.खोट्या स्तुतीला पहिल्याच नजरेत,

तोंडाबाहेर पडायच्या आधीच ओळखले जाऊ शकते आणि ती अगदी उथळ व खोटी असते.


आजच्या जगात खरी स्तुती दुर्मिळ झाली आहे. असे काय होते कोण जाणे की चांगल्या क्रमांकानी उत्तीर्ण झालेल्या आपल्या मुलाची किंवा मुलीची स्तुती करण्याचा आम्हाला बरेचदा विसरच पडतो किंवा आम्ही आपल्या मुलाला त्यावेळी प्रोत्साहित करायला विसरून जातो, जेव्हा ते पहिल्यांदा चांगला केक यशस्वीपणे बनवतात किंवा पाखरांसाठी घरटे बनवतात. मुलांना आपल्या आई - वडिलांकडून झालेल्या स्तुतीने जो आनंद मिळतो, त्यापेक्षा जास्त आनंद अन्य कुठल्याच गोष्टीने मिळत नाही.


पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही क्लबमध्ये चांगल्या भोजनाचा आनंद घ्याल,तेव्हा खानसाम्याला नक्की निरोप पाठवा की जेवण रुचकर होते आणि जेव्हा कोणी थकलेला विक्रेता तुमच्याशी सभ्यपणे वागेल तेव्हासुध्दा या गोष्टीचा उल्लेख जरूर करा.


प्रत्येक पादरी,प्रत्येक भाषण देणारा आणि प्रत्येक सार्वजनिक वक्ता हे जाणतो की जर श्रोत्यांमधून एकाही व्यक्तीने टाळी वाजवली नाही तर किती वाईट वाटते आणि किती उत्साहभंग होतो.व्यावसायिकांना जे लागू होते ते ऑफिस,दुकाने, कारखान्यांमधले कर्मचारी, कुटुंबीय आणि मित्र परिवार यांना तर दुपटीने लागू होते.

आमच्या संबंधात आम्हाला याचा कधी विसर पडायला नको की आमचे साथीदार अखेर मानव आहेत आणि स्तुतीचे भुकेले आहेत.हाच तो अस्सल शिक्का आहे ज्याला प्रत्येक जण पसंत करतो.


आपल्या प्रत्येक दिवसाच्या प्रवासात कृतज्ञतेच्या ठिणग्या मार्गावर पसरवण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला नवल वाटेल की कशा तऱ्हेने या ठिणग्यांमुळे मैत्रीच्या छोट्या-छोट्या वाती उजळतील,ज्यामुळे तुमच्या भावी प्रवासात तुम्हाला ऊब मिळेल.


न्यू फेयरफिल्ड,कनेक्टिकट इथल्या पामेला डनहॅमच्या अनेक जबाबदाऱ्यांपैकी एक जबाबदारी होती नवीन कर्मचाऱ्याच्या देखरेखीची,ज्याचे काम अत्यंत वाईट होते.दुसरा कर्मचारी त्याची खूपटर उडवत असे तो किती वाईट काम करतो असे सांगत.ही खूपच वाईटपध्दत

होती.आणि दुकानातला अमूल्य वेळ वाया जात असे. ( मित्र जोडा,डेल कार्नेगी,अनु-कृपा कुलकर्णी,मंजुल पब्लिशिंग हाऊस )


पॅमने या कर्मचाऱ्याला प्रेरणा देण्याचे अनेक उपाय अंमलात आणले,पण काही लाभ झाला नाही.मग तिला असे लक्षात आले की कधी तरी तो कुठले तरी काम चांगल्या तऱ्हेने करून घेतो. पॅमने निर्णय घेतला की जेव्हा कधी अशी संधी येईल तेव्हा ती इतरांसमोर त्याची स्तुती करेल. असे केल्यावर सर्वांना दिसून आले की दर दिवशी त्याच्या कामात सुधारणा होत गेली आणि लवकरच तो आपले काम चांगल्या तऱ्हेने करू लागला.आता सर्व जण त्याची स्तुती करतात आणि त्याला सन्मान देतात.खऱ्या स्तुतीने सकारात्मक परिणाम मिळाले,उलट आलोचना व टिकेने हाती काहीच आले नव्हते.


लोकांना टोमणे मारून जखमी केल्याने ते कधीच बदलत नाहीत,न त्यामुळे काही सकारात्मक प्रभाव पडतो.म्हणून असे वर्तन करणे निरर्थक असते.एक जुनी म्हण आहे,जी मी माझ्या आरशावर चिकटवून ठेवली आहे.ती मी रोज वाचतो :


मी या रस्त्यावर फक्त एकदाच चालेन... म्हणून जर मी काही चांगले काम करू शकतो किंवा कुणाचे भले करू शकतो तर मी ते आत्ताच करेन. मी त्याला टाळणार नाही, दुर्लक्ष करणार नाही. कारण पुन्हा मी या रस्त्यावर परतून येणार नाही.


इमर्सनने म्हटले होते,"प्रत्येक व्यक्ती माझ्यापेक्षा कुठल्या ना कुठल्या गोष्टीत सरस असते.मी त्याची ती गोष्ट शिकून घेतो."


जर हे इमर्सनसाठी खरे असेल तर तुमच्या माझ्या बाबतीत तर ते हजार पटीने जास्त खरे आहे.आम्ही आपल्या इच्छांबद्दल विचार करणे सोडायला हवे.आम्ही लबाडीला विसरायला हवे, प्रामाणिकपणे खरी प्रशंसा करायला हवी, मनापासून स्तुती करायला व मुक्तकंठाने कौतुक करायला हवे.जर तुम्ही असे कराल तर तुम्हाला असे आढळून येईल,की लोक तुमच्या शब्दांना त्यांच्या आठवणींच्या तिजोरीत ठेवतील आणि आयुष्यभर त्यांना ते शब्द आठवत राहतील. तुम्ही जे म्हटलं ते तुम्ही विसरून जाल,पण ते मुळीच विसरणार नाहीत.