* विजय गायकवाड | Vijay Gaikawad

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

२१/७/२४

चिनी आणि मोगल The Chinese and the Mughals

बुद्धाने जातिभेद नाकारले होते.परंतु भारतीय समाजात जातिभेद विरून जाऊ शकले नाहीत व शेवटी बौद्ध धर्मच लयाला गेला.पण भारताबाहेर ईशान्येस चीन,कोरिया,

मंगोलिया, जपानपर्यंत व आग्नेयेस ब्रह्मदेश थायलंड, कंबोडिया,इन्डोनेशियापर्यंत बौद्ध धर्म फैलावला. चीनच्या यांगत्से व पिवळ्या नद्यांच्या खोऱ्यांतल्या सुपीक मैदानात नाईल नदीच्या खोऱ्यासारखीच समृद्ध शेती होत होती.

तिच्या जोरावर कारागिरी,विद्याव्यासंग पोसले होते. जेव्हा भारतातून बौद्ध भिक्खु चीनमध्ये पोचले, तेव्हा त्यांनी आणलेले आयुर्वेदाचे ज्ञान चिन्यांना हवे होते,म्हणून त्यांचे स्वागत केले गेले.त्यांना राजदरबारात नेले.तिथे त्यांनी राजासमोर लवण्यास नकार दिला;म्हणाले,आम्ही फक्त बुद्धापुढे वाकतो.खरे तर ह्या उर्मटपणाबद्दल त्यांना देहदंड देण्याची रूढी होती; पण चीनच्या सम्राटाने त्यांना माफी दिली. बौद्ध धर्माचा प्रचार करण्याची मुभा दिली.चिनी लोक शोध लावण्यात पटाईत.बुद्धाचा संदेश पसरवण्यासाठी त्याच्या चिक्कार प्रती काढायला हव्यात.हाताने लिहीत बसण्यात फार वेळ जातो, श्रम लागतात.मग त्यांनी इसवी सनपूर्व दोनशे वर्षे बांबूचा कागद बनवण्याची कृती शोधून काढली आणि ब्लॉक प्रिन्टिंगचीही.


युरोपीय बढाई मारतात की जगात प्रथम जर्मनीत गुटेन्बर्गने शतकात मुद्रणकलेचा शोध लावून बायबल छापले.पण त्याच्या तब्बल अठरा शतके आधीच चिनी बुद्धाचा संदेश छापू लागले होते. चिन्यांनीच होकायंत्राचा,

बंदुकीच्या दारूचा, अग्निबाणांचा शोध लावला.ज्ञानाच्या इतरही अनेक शाखांत चिन्यांनी उत्तम प्रगती केली. 


चिनी समाज भारतीय समाजासारखा जाती-पातींनी चिराळलेला नव्हता.चिन्यांना अंगभूत बुद्धीच्या बळावर मॅन्डारिन ह्या शासकवर्गात प्रवेश करून समाजात वर येता येणे शक्य होते.ह्या सर्व वैशिष्ट्यांमुळे पंधरा -

सोळाव्या शतकांपर्यंत चीन हा जगातला ज्ञान- तंत्रज्ञानात अग्रेसर देश होता.


चीनचाच उत्तरेचा शेजारी मंगोलिया.इथे सुपीक शेती बिलकूल नव्हती,होते फिरस्त्यांचे पशुपालन.ते घोड्यांवर बसून गुरांचे कळप हाकत हाकत कुरणांच्या शोधात हिंडायचे.अशा जीवनशैलीतून इतर समाजांवर आक्रमण करण्यासाठी उपयुक्त अशी अनेक तंत्रे,कौशल्ये पोसली जातात.साडेतीन हजार वर्षांपूर्वी वैदिक संस्कृती अशाच समाजांत निर्माण झाली होती, आणि भारतात फैलावली होती.इसवी सनाच्या बाराव्या शतकात मंगोलियात अशाच समाजात 'झाले बहु,होतील बहु,परंतु ह्यासम हा' असा चेंगीजखान हा डोकेबाज,धीट पुढारी जन्मला. त्याने घोडे भरधाव दौडत असताना दोनही हात सोडून धनुष्याने बाण मारण्याचे तंत्र विकसित केले.रात्री रंगीत दिवे वापरत सैन्याच्या सुसूत्र हालचाली करण्याचे तंत्र विकसित केले.

अशा युद्धतंत्रांच्या बळावर त्याने इराकपासून पूर्ण मध्य आशिया व हंगेरी- रशियाच्या बऱ्याचशा भागासकट थेट चीन- कोरियापर्यंत पसरलेले विस्तृत साम्राज्य स्थापले.

इटलीतल्या व्हेनिस ह्या व्यापाराच्या दृष्टीने महत्त्वाच्या शहराला त्याच्या सैन्याने वेढा घातला होता.हे साम्राज्य नीट हाकण्यासाठी एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत वेगाने संदेश पोहोचले पाहिजेत. त्यासाठी त्याने वीस-तीस किलोमीटरच्या अंतरांवर घोड्यांची ठाणी बसवली.तिथे नेहमी ताज्या दमाचे घोडे व घोडेस्वार सज्ज असायचे. चेंगीजखानाचा कोणताही खलिता घेऊन स्वार निघाला की तो भरधाव पुढच्या ठाण्यापर्यंत जायचा.तिथून तातडीने नवा स्वार निघायचा. अजिबात वेळ न गमावता हवे तिथे संदेश पोचवला जायचा.वाटेत जर घोड्याला काहीही दुखापत झाली,तर जो पहिला घोडा भेटेल, त्याला ताब्यात घेऊन पुढची दौड सुरू व्हायची. कोणी ह्या कामासाठी घोडा द्यायला नाकारले, तर त्याला देहदंड ठोठावला जायचा. प्रतिभाशाली चेंगीजखानाने युद्धनीतीत, शासननीतीत अशी अनेक नवनवी स्मरुके निर्मिली.त्याच्या साम्राज्याबरोबर तीही फैलावली. वर आपण उल्लेख केला होता की संत ज्ञानेश्वरांनी निर्मिलेली स्मरुके फैलावली. पण त्यांच्या ह्या प्रतिभेला कदाचित आधारभूत असलेली जनुके त्यांच्या बरोबरच लयाला गेली असावीत.चेंगीजखानचे असे झाले नाही.आजच्या शास्त्रीय प्रगतीमुळे मानवाच्या आनुवंशिकतेचा आधार असणारे रेणू अभ्यासून जनुकांचा प्रसार कसा होतो ह्याचा अभ्यास साध्य झाला आहे.मध्य आशियाच्या मोठ्या पट्ट्यात आज एक विशिष्ट जनुकसंच प्रचंड प्रमाणात आढळतो.हा कुठून आला? जवळजवळ नक्की की चेंगीजखानापासूनच ह्या खास जनुकसंचाचा उगम झाला असावा.तेव्हा चेंगीजखानाने निर्मिलेले अनेक स्मरुक जसे वेगाने पसरले,तसे जोडीनेच त्याचे जनुकही फैलावले असावेत ! अशा साऱ्या घडामोडींतून चेंगीजखानाने चीनपासून ते अरब देश व युरोपपर्यंत दळणवळण सुरू केले.त्यातून चीनमधले बंदुकीच्या दारूसारखे शोध प्रथम अरबांपर्यंत व नंतर युरोपात पोचले.चीनच्या रेशीम आणि इतर अनेक उत्पादनांना युरोपात मोठी मागणी होती. ह्यातून जो व्यापार सुरू झाला त्यातून आर्थिक उलाढालींना मोठी चालना मिळाली.इटलीत जो पैसा लोटला,त्यातून युरोपात बाराव्या शतकानंतर एक नवचैतन्य बहरले.


युरोप….


प्राचीन ग्रीक संस्कृतीत अगणित देवांची आणि निसर्गाचीही पूजा चालू होती.अशा वातावरणात अतिशक्तिमान केन्द्रीय शासनाला वाव नव्हता, आणि एकूण परिस्थिती मुक्त विचारांना, अभिव्यक्तीला अनुकूल होती.साहजिकच ग्रीसमध्ये बुद्ध कालापासून इसवी सनाच्या पहिल्या दोन शतकांपर्यंत ज्ञान - विज्ञान-साहित्य शिल्प बहरली होती.ईसाई धर्मानुसार राजा हा ईश्वरी अंश आहे असा अर्थ लावता येत होता.तेव्हा राजसत्तांच्या पाठिंब्यातून ग्रीसमध्ये व हळूहळू सर्वच युरोपभर ईसाई धर्माचा प्रसार झाला.आता बायबलात दिले तेच सत्य,

इतर पाखंड,व हे पाखंड जबरदस्तीने दडपणे समर्थनीय आहे अशी विचारसरणी फैलावली व ज्ञान विज्ञानाचा झपाट्याने ऱ्हास झाला.युरोपीय प्लेटो,

सॉक्रेटिस,ॲरिस्टॉटल,आर्किमिडिज अशा विद्वानांचे लिखाण पूर्ण विसरून गेले.ग्रीसच्या पूर्वीच इजिप्त, इराकसारख्या अरब देशांत आधुनिक ज्ञान - विज्ञानाची भरभराट झाली होती.ह्या देशांचा ग्रीसशी जवळचा संपर्क होता.ईसाई धर्माच्या प्रसाराबरोबर ग्रीसमधल्या ज्ञान विज्ञानाचा नाश झाला तेव्हा त्या साहित्याचा अरबी भाषेत अनुवाद करून अरबांनी हे ज्ञान जिवंत ठेवले;ते त्यात भरही घालत राहिले.(वारुळ पुराण,माधव गाडगीळ,

ई.ओ.विल्सन,संक्षिप्त अनुवाद नंदा खरे,मनोविकास प्रकाशन) युरोपात बाराव्या शतकानंतर जेव्हा ज्ञान - विज्ञानाची जोपासना पुनश्च सुरू झाली,तेव्हा अरबांनी जपलेल्या ग्रिट ज्ञान- विज्ञानाचे पुनरुज्जीवन केले गेले.


हे होत असताच युरोपावर अनेक संकटे आली.विशेषत:

तेराशे साठपासून सोळाशे सदुसष्टपर्यंत प्लेगच्या एकामागून एक साथी येत राहून लोक मोठ्या प्रमाणावर मृत्युमुखी पडले.पंधराशे पन्नास पासून अठराशे पन्नास पर्यंत एक छोटे हिमयुग सुरू होऊन शेतीचे उत्पन्न खूप घटले. ह्या शतकांत जंगलांची बेसुमार तोड होऊन हिवाळ्यात उबेला जाळायला लाकूडही मिळेना


ह्या सगळ्या अडचणींना तोंड द्यायला भक्कम ज्ञान - विज्ञानाची मोठी मदत होईल ही जाणीव युरोपात पसरली,

आणि ह्या मंथनातून वस्तुनिष्ठता,तर्कशुद्धता व मांडणीतून जे पडताळता येतील असे काही तरी वेगळे,नवे निष्कर्ष काढण्याची क्षमता ह्या तीन महत्त्वाच्या पैलूंवर आधारित वैज्ञानिक कार्यपद्धती विकसित झाली.ज्ञानसर्जनाच्या इतर साऱ्या प्रणालींहून अतिशय वेगाने वैज्ञानिक कार्यपद्धतीद्वारा नवे ज्ञान निर्माण करता येते.युरोपात सतराव्या शतकापर्यंत ही कार्यपद्धती नेटकेपणे कार्यरत करण्यासाठी विद्यापीठे,वैज्ञानिकांच्या संघटना, संशोधन केन्द्रे प्रस्थापित केली गेली,आणि विज्ञान व तंत्रज्ञानाची प्रगती झपाट्याने सुरू झाली.ह्यातून निर्माण झालेल्या ज्ञानाचा वेगवेगळ्या प्रकारे फायदा उठवता आला.ह्यात खास महत्त्वाची होती दोन क्षेत्रे नौकानयन आणि युद्धकला.नौकानयनासाठी खगोलशास्त्र फार उपयुक्त होते,आणि इसवी सनाच्या दुसऱ्या शतकातील अरब - ग्रीक खगोलशास्त्रज्ञ टोलेमीच्या काळापासून पंधरा- सोळाव्या शतकापर्यंत युरोपात पूर्णपणे थंडावलेल्या खगोलशास्त्रात झपाट्याने प्रगती सुरू झाली.


वस्तुनिष्ठता हे विज्ञानाचे व्यवच्छेदक लक्षण आहे,तेव्हा खगोलशास्त्राच्या प्रगतीसाठी काटेकोरपणे केलेली निरीक्षणे फार महत्वाची होती.ही गोळा करण्यात सर्वांहून मोठे,महत्त्वाचे योगदान केले मर्डेकरांनी खास उल्लेखिलेल्या टैको ब्राहीनी.ह्या काळात सामाजिक प्रतिष्ठा लाभलेल्या शास्त्रीय संशोधनात अनेक युरोपीय श्रीमंतांनी पुढाकार घेतला,तसाच हा टैको ब्राही 


डेन्मार्कच्या राजदरबारातला एक उमराव होता.

पण एक दरबारी म्हणून त्याचा अंतही एका राजदरबारातल्या मेजवानीत विलक्षण प्रकारे झाला.अशा मेजवानीत भरपूर मद्यपान व्हायचे,तेव्हा मूत्राशये गच्च भरून जायची.पण इतरांच्या आधी उठणे हे शिष्टाचारा

विरुद्ध होते.तेव्हा दाबून धरणे भाग असायचे.एका मेजवानीत हे मर्यादेबाहेर गेले.मग टैको ब्राहीची कोंडलेली लघवी कायमचीच रोखली जाऊन तो नंतर अकरा दिवसांनी स्वर्गवासी झाला.मरताना त्याने स्वतःबद्दल लिहून ठेवले. टैको ब्राही एका सिद्धपुरुषासारखा जगला आणि महामूर्खासारखा मेला ! 


भारत पादाक्रान्त करण्यात इंग्रजांना नौकानयन आणि युद्धकला ह्या दोनही सामर्थ्यांचा प्रचंड फायदा झाला.

मराठ्यांच्या आरमारातल्या नौका खोल समुद्रात जाऊ शकत नव्हत्या,तर इंग्रजांची गलबते साता समुद्रांना सहज ओलांडू लागली होती.वैज्ञानिक कार्यपद्धतीतून युद्धकलेत कशी सरशी करता आली ह्याचे नेटके उदाहरण आहे.


म्हैसूरच्या टिपू सुलतानाबरोबरच्या लढाया. चिन्यांनी शतकातच रॉकेट,अग्निबाण शोधले होते.तिथून ते भारतात पोहोचले होते.म्हैसूरचा टिपू सुलतान ते युद्धात वापरत होता.१७८० मध्ये इंग्रजांची म्हैसूर सेनेशी पहिली लढाई झाली.त्यात टिपूच्या सैन्याने केलेल्या अग्निबाणांच्या माऱ्यातून इंग्रज फौज चक्रावून गेली,धूम पळाली.पण हा पराभव स्वीकारताना इंग्रजांनी वापरलेले,न फुटलेले अग्निबाण गोळा करून मायदेशी पाठवले.इंग्रजांचा दारूगोळ्याचा कारखाना वूलवर्थ गावी होता.त्या कारखान्याला जोडून दारूगोळा अधिकाधिक परिणामकारक बनवण्याचे संशोधन चालायचे.त्या प्रयोगशाळेत सापडलेल्या अग्निबाणांचा अभ्यास करून त्यांनी त्यांना कसे तोंड द्यायचे याचे डावपेच रचले. स्वतःबनवण्याचे प्रयत्न सुरू केले.दरम्यान टिपूला शास्त्रीय संशोधन हा विषयच ठाऊक नव्हता.तेव्हा इंग्रजांबरोबरच्या १७९२ च्या पुढच्या लढाईत टिपूचे युद्धतंत्र 'जैसे थे' होते. इंग्रजांचे पुढे गेले होते.म्हणून 'थांबला तो संपला' या न्यायाने दुसऱ्या लढाईत इंग्रजांनी टिपूचा धुव्वा उडवला.मराठ्यांची पण हीच गत होती.

इतिहासाचार्य राजवाडे सांगतात की एवढ्या बुद्धिमान नाना फडणवीसांच्या संग्रहात इंग्रजांकडून पकडलेल्या दुर्बिणी, होकायंत्रे होती;पण त्यांचा उपयोग काय,याचा

त्याने काहीही विचार केल्याची नोंद नाही.


एक महत्त्वाची नोंद - रॉबर्ट बेरोन वोन हेन गेल्डर्न (१८८५ - १९६८) या लांबलचक नावाचा नामांकित ऑस्ट्रियन एंथ्रोपोलोजिस्ट होऊन गेला.हा विएन्ना विद्यापीठात शिकला.पुढे १९१० मध्ये भारत आणि ब्रह्मदेशाच्या दौऱ्यावर आला. 


भारतीयांच्या प्रगत ज्ञानाविषयी प्रचंड कुतूहल वाटले म्हणून त्याने अभ्यास सुरू केला. 


त्याने दक्षिण-पूर्व देशांबद्दल प्रचंड संशोधन केले.आणि त्याच्या पूर्ण अभ्यासाअंती त्याने ठामपणे असे मांडले की,भारतीय जहाजे,कोलंबसच्या कितीतरी आधी मेक्सिको आणि पेरूमधे जात होती!भारतीय नौकांचा प्रवास विश्वव्यापी होत होता.याचा यापेक्षा दुसरा कुठला स्पष्ट पुरावा हवा आहे..? आणि तरीही आम्ही म्हणत राहणार की अमेरिकेला कोलंबसने शोधलं आणि भारताचा 'शोध' (!) वास्को-डी-गामा ने लावला!!मुळात वास्को-डी-गामा हाच भारतीय जहाजांच्या मदतीनं भारतापर्यंत पोहोचला.

डॉ.हरिभाऊ (विष्णू श्रीधर) वाकणकर हे उज्जैनचे प्रसिद्ध पुरातत्त्ववेत्ता.भारतातील सर्वांत प्राचीन वसाहतीचा पुरावा म्हणून ज्या 'भीमबेटका' गुहांचा उल्लेख होतो,त्या डॉ.वाकणकरांनीच शोधून काढलेल्या आहेत.


डॉ.वाकणकर त्यांच्या अभ्यासाच्या संदर्भात इंग्लंडला गेले होते.तिथे एका संग्रहालयात त्यांना वास्को-डी-गामाची दैनंदिनी ठेवलेली दिसली.ती त्यांनी बघितली आणि त्याचा अनुवाद वाचला.


त्यात वास्को-डी-गामाने तो भारतात कसा पोहोचला याचे वर्णन केले आहे.वास्को-डी-गामाचे जहाज जेव्हा आफ्रिकेतील जान्जीबारला आले,तेव्हा त्याने तिथे त्याच्या जहाजाच्या तिप्पट आकाराचे मोठे जहाज बघितले.


एका आफ्रिकन दुभाष्याला घेऊन हा,त्या भारतीय जहाजाच्या मालकाला भेटायला गेला. 'चंदन' नावाचा तो भारतीय व्यापारी अत्यंत साध्या वेषात खाटेवर बसला होता.जेव्हा वास्को-डी-गामाने भारतात येण्याची इच्छा दाखविली,तेव्हा सहजपणे त्या भारतीय व्यापाऱ्याने सांगितले,'मी उद्या भारतात परत चाललोय.तू माझ्या मागोमाग ये...'


आणि अशा रीतीने वास्को-डी-गामा भारताच्या किनाऱ्याला लागला..!!


दुर्दैवाने आजही शाळेत शिकवल्या जाणाऱ्या पुस्तकांत 'वास्को-डी- गामाने भारताचा 'शोध' लावला असा उल्लेख असतो..!!'


भारताचे नौकानयन शास्त्र.. (भारतीय ज्ञानाचा खजिना,प्रशांत पोळ,स्नेहल प्रकाशन )






१९/७/२४

बंडखोर मुसा / Rebel mouse

मूसा आता धनगर बनला.वाळवंटाच्या कडेला असलेल्या ओसाड भागात,डोंगर-पहाडात तो राही.त्याच्या शिक्षणातील नवीन प्रकरण जणू सुरू झाले.

विद्यापीठातील धुळीने भरलेली ती हस्तलिखित सोडून तो बाहेर पडला.मृतांच्या छायामय जीवितांविषयीच्या कल्पना व कथा सोडून तो बाहेर पडला.आता रात्रीच्या वेळेस तो आकाशातील तारे बघे.ईश्वराची ती जळजळीत तेजोमय लिपी आकाशपटावर तो पाही. 


इजिप्शियन लोक गाय,कुत्रा वगैरेंनाही देव मानीत.मूसाने ईश्वराविषयींच्या या साऱ्या पोरकट कल्पना आपल्या मनातून काढून टाकल्या.तो निराळा नवा देव शोधू लागला.अधिक उदात्त, भव्य व दिव्य असा परमेश्वर तो पाहू लागला. वाळवंटात उठणाऱ्या वादळांवर स्वार झालेला असा परमेश्वर कधी त्याला दिसे.मेघांच्या गर्जनेत,विजांच्या कडकडाटात त्या प्रभूचा आवाज त्याला ऐकू येई आणि सकाळी सूर्याचे किरण येत,वाळवंटातील झुडपांवर ते किरण पडत;आणि ती झुडपे पेटल्याप्रमाणे दिसत.त्या प्रदीप्त झुडपांत प्रभूचे मुखमंडल जणू तो प्रत्यक्ष समोर पाही.मूसाला नवीन परमेश्वर सापडला. त्या वाळवंटात त्याला नवा देव मिळाला.हा परमेश्वर भयंकर होता.ओसाड रानावनात सापडलेला तो परमेश्वर होता.

अरबी लोकांच्या परमेश्वराप्रमाणे कठोर व उग्र असा हा प्रभू होता. पर्वतांवरून उड्डाण करणारा,वाळवंटातून पार जाणारा.भव्य भडक अशा तंबूत राहणारा,असा हा परमेश्वर होता.लोक झोपले असता त्यांना तो सांभळतो;

त्यांना युद्धात घेऊन जातो;निर्दयपणे आपल्या लोकांच्या शत्रूचा निःपात करतो; वाऱ्याप्रमाणे स्वतःचे मन बदलतो;

मनात येईल तसे करतो;अपमानाचा पटकन् सूड घेतो;खोटे सांगून हेतुसिद्धी होत असेल तर हा देव खोटे बोलायलाही मागे-पुढे पाहत नाही.हा असा देव आहे,की अन्याय ज्याला सहन होत नाही; परकीयांविषयीही तो उदारता दाखवितो,पोरक्या पोरांचा तो प्रेमळ पिता बनतो;गरिबांवर दया करतो.अरबस्तानातील बदाऊनमध्ये जे जे गुण व

दुर्गुण आहेत,ते थोडक्यात या देवाच्या ठायी आहेत.

जणू मूसाने आरशात पाहिले आणि स्वतःच्याच स्वरूपात त्याला परमेश्वर आढळला. मूसाने जिहोवाचे जे चित्र रंगविले आहे, ते त्याचे स्वतःचेच अनंत पटीने वाढवलेले असे चित्र आहे.


मूसा पुष्कळ वर्षे वाळवंटातच राहिला. 


वाळवंटातील ती अनंत शांती त्याला आवडे.त्या गंभीर शांतीने मूसाचे विचार वाढले.विचारांचा विकास व्हायला अवसर मिळाला.वाळवंटातील अपार शांती,तेथील ते निःस्तब्ध अनंत आकाश यांच्या संगतीत त्याच्या गूढ स्वभावाला,त्याच्या चिंतनशील मनाला भरपूर खाद्य मिळाले.एका सुखवस्तू बदाऊन सरदाराच्या मुलीशी त्याने लग्न लावले आणि चिंतनशील शांत जीवन तो कंठू लागला.परंतु इजिप्तमध्ये ज्या गुलामांना सोडून आला होता,त्यांच्याविषयीचा विचार त्याला सचिंत करी.आपल्या बदाऊन मित्रांजवळ त्यांच्याविषयी तो बोले.त्यांच्या उज्ज्वल भूतकाळाविषयी व आजच्या अधःपतित स्थितीविषयी तो सांगे.आपल्या या हतपतित बंधूंची करुण-कहाणी ऐकून बदाऊन सहानुभूती प्रकट करीत.

इजिप्तमधील हे लोक त्यांचेच होते. बदाऊनांचाही अब्राहम हाच मूळ पुरुष.ज्या अब्राहमने आपल्या जातीला नवनवे स्थान मिळावे म्हणून सर्व वाळवंटातून धैर्याचे नवतेज पेटवले,तोच अब्राहम अरब बदाऊनांचा व इजिप्तमधील दास्यमग्न ज्यूंचा पूर्वज.


हळूहळू मूसाच्या मनात एक विचार आला. इजिप्तमधील दास्यमग्न ज्यूंनी इकडे पळून यावे; व वाळवंटात स्वतंत्र व्हावे,असे त्याला वाटले आणि नंतर पूर्वजांचे ते पहिले स्थान कनान तिथेही या सर्वांना आपण घेऊन जाऊ असे त्याला वाटले.ज्यूंना त्यांचे पहिले स्थान परत देणे,त्यांची जुनी मातृभूमी त्यांना परत देणे, त्यांना नवधर्म देणे ! किती महनीय उदात्त असे हे ध्येय ! हे भव्यदिव्य स्वप्न मनात खेळवीत मूसा सिनाई पर्वतावर शेळ्या-मेंढ्या चारीत बसे.


याच सुमारास इजिप्तमधील राजा मरण पावला. नवीन राजा गादीवर बसला.इजिप्तमधून पूर्वेकडे येणाऱ्या कारवानांच्या तोंडून तिकडील या घडामोडी मूसाला कळल्या.कृती करायला योग्य संधी आली होती.आणि मूसा पुन्हा इजिप्तमध्ये गेला.तो त्या गुलामांत सर्वत्र हिंडूफिरू लागला. बंड करा असे तो त्यांना सांगू लागला.

कामाची हत्यारे खाली ठेवा.संप करा,काम बंद पाडा. दगड वाहू नका;चढवू नका;विटा भाजू नका. असे तो सांगू लागला.जुलमी धन्याचे काम काय म्हणून करावयाचे ?


इजिप्शियन राजपुत्र असणारा मूसा, अरबस्तानात धनगर होऊन राहणारा मूसा आता इजिप्शियन श्रमजीवींचा बंडखोर पुढारी झाला.इतिहासातील विटा भाजणाऱ्या कामगारांचे पहिले संघटन त्याने निर्मिले.ते पहिले कामगार युनियन.


मूसाने इजिप्शियन राजाकडे ज्यूंना मुक्त करा असा अर्ज केला.परंतु राजाने प्रथम लक्ष दिले नाही.परंतु पुढे आपले मन बदलले.हे ज्यू दास रोगग्रस्त होते.हे मरतुकडे होते.

अत्यंत गलिच्छ वसतीत राहात.इजिप्त राष्ट्राला अशा लोकांपासून भय आहे,असे राजाला वाटले. इजिप्तमधील कितीतरी रोगांच्या साथी ज्यूंच्या या भिकार वसतीत प्रथम सुरू होत.मूसानेही ज्यूंना स्वच्छ सांगितले की इजिप्तमधील दहा प्लेगांची जबाबदारी तुमच्यावर आहे.तुमच्या डोक्यावर ते पाप आहे.शेवटी जेव्हा मूसाच्या नेतृत्वाखाली ज्यू इजिप्तमधून निघाले तेव्हा त्यांना परवानगी देताना इजिप्शियन राजाला वाईट न वाटता उलट आनंदच झाला.


ज्यूंचे हे महाप्रयाण त्यांच्या इतिहासात जरी अत्यंत महत्त्वाचे असले,तरी इजिप्शियनांच्या इतिहासात त्याला मुळीच महत्त्व नाही.जणू एक साधी क्षुद्र गोष्ट असे त्यांना वाटले.जुन्या करारात या महाप्रयाणाच्या यात्रेची भव्य,

भडक कथा रंगवलेली आहे.प्राचीन काळी प्रत्येक राष्ट्रांच्या इतिहासात सत्य व कल्पना यांचे मिश्रण केलेले असे.सत्यकथांत कल्पना मिसळलेली असे. ऐतिहासिक कादंबरी वा नाटक तयार केले जाई.


मूसाबरोबर जे ज्यू आले ते रांगडे होते.त्याच्यांत ऐक्य नव्हते.वृत्तीने ते भांडखोर होते.त्यांची नीट संघटना नव्हती.

परंतु मूसाच्या अलौकिक प्रतिभेने व बुद्धीने या लोकांची अभेद्य अशी एकजूट जन्माला आली.हे अभंग ऐक्य एकाएकी निर्माण झाले नाही.मूसाला त्यासाठी कितीतरी वर्षे प्रयत्न करावा लागला.या ज्यूंचे एक राष्ट्र बनविण्यापूर्वी मूसाने त्यांना नवीन स्मृती दिली; नवीन कायदे दिले.त्या ज्यू मध्ये एक नवीन प्राण त्याने फुंकिला.

मूसा जन्मजात पुढारी होता.या ज्यूंच्या साध्या मनावर परिणाम करण्यासाठी त्याने भव्यदिव्य विधी निर्माण केले.मानवी मनाला स्तंभित करणाऱ्या भव्य अशा नैसर्गिक स्थानी हे विधी करावयाचे,यासाठी त्याने तो सिनाई पर्वत पसंत केला.सिनाई पर्वताची ती काळीकभिन्न अशी,मेघांना फोडून वर जाणारी पाच शिखरे;पांढऱ्या वाळूचे धो ऽ करणारे लोंढे, सिनाई पर्वतावरील ते दगडधोंडे,ते कडे,ज्यांतून ईश्वराचे अट्टाहास्य जणू प्रतिध्वनित होई,ईश्वराचे आदेश जणू जेथून उद्घोषिले जात आहेत असे वाटे;अशी ही सिनाई पर्वताची जागा म्हणजे योग्य असे भव्य व्यासपीठ होते.या व्यासपीठावर बसून स्वर्ग व पृथ्वी एकत्र आणणे शक्य झाले असते..या सिनाई पर्वतावर बसून मूसाने आपला तो नवधर्म दिला.ते अर्धवट रानटी व अर्धवट उदात्त असे नीतिशास्त्र त्याने दिले.त्या नीतिशास्त्राने आजपर्यंत मानवांना मार्गही दाखविला आहे व पदच्युतही केले आहे. मूसाच्या या उपदेशात जरी प्रसंगविशेषी क्रौर्य दिसत असले,कोठे कोठे जरी बालिशता असली, तरी मानवी हृदयात मानवी विचार ओतण्याचा इतिहासकाळातील तो पहिला थोर प्रयत्न होता. त्याने तुझा डोळा फोडला तर तू त्याचा डोळा फोड,असे तो शिकवितो.परंतु त्या आरंभीच्या रानटी अवस्थेतून जो नुकताच बाहेर पडत आहे, त्याच्यापासून तुम्ही असे आदेश ऐकलेत तर त्यात आश्चर्य वाटण्यासारखे ते काय ? परंतु मूसाने गरिबांवर प्रेम करा व परकीयालाही सहानुभूती द्या,असेही सांगितले आहे.आजचा सुसंस्कृत समजला जाणारा विसाव्या शतकातील मनुष्य हा गरिबांना प्रेम देणे व परकीयांस सहानुभूती दाखविणे,एवढे तरी करतो का? मूसाचा उपदेश तीन हजार वर्षे झाली तरीही आपण अद्याप आपलासा केला नाही.मूसा जितका उंच चढला,तितके तीन हजार वर्षे झाली,तरी आपण चढलो नाही.मूसा आपल्यापुढे गेलेला आहे.आणि आपण अद्याप मागासलेले व रानटी आहोत.या मुसानेच मनुष्याचे बळी देऊ नये म्हणून शिकविले,हे आपण विसरता कामा नये.मूसाची ही उदार आज्ञा,त्याची ही प्रेमळ शिकवण अद्यापही आपण ऐकिली नाही. १९१४मध्ये लाखो आईबापांनी आपल्या मुलांचे युद्ध देवाला बळी दिले.


असे सांगतात,की ध्येयाला पोहोचण्यापूर्वीच मूसा मेला.

जो प्रदेश त्याला पुन्हा मिळावावयाचा होता,तिथे जाण्यापूर्वीच तो देवाघरी गेला.त्याने ज्या कामाचा आरंभ केला होता ते पुढे दुर्बळांच्या अंगावर पडले.त्यांना ते झेपेना,पार पाडता येईना.जगातील मोठ्यांतील मोठ्या क्रांतिकारकांच्या बाबतीत सदैव हीच गत झाली आहे.

मूसापासून तो लेनिनपर्यंत हाच दुर्दैवी अनुभव.परंतु मरण्यापूर्वी मूसाने स्वतःच्या दुबळ्या लोकांतील दुबळेपणा झडझडून पार फेकून दिला होता.वाळवंटातील स्वच्छ व जोरदार वारे आणून तो रोगटपणा त्याने नष्ट केला होता.त्याने जगायला नालायक असणाऱ्या जुनाट दुबळ्या दुर्बलांना खुशाल मरू दिले. त्यांच्याऐवजी नव्या दमाची,उत्साही अशी अग्रेसरांची पिढी त्याने उभी केली.

मृतप्राय लोकांतील निराश असा अवशिष्ट भाग त्याने वाळवंटात आणला आणि त्याच्याकडून संघटित असे नवराष्ट्र त्याने निर्मिले.हे राष्ट्र कधी मरणार नाही,मरायला कधीही तयार होणार नाही.


१७.०७.२४ या लेखातील शेवटचा दुसरा भाग..





१७/७/२४

बंडखोर राजपुत्र मुसा/The rebel prince Musa

प्राचीन काळातील बहुतेक राष्ट्रे आता नामशेष झाली आहेत,हे मागील आपण पाहिले.त्यांतील काही राष्ट्रे अद्याप जीव धरून कशीतरी राहिली आहेत.परंतु त्यांचा इतका अधःपात झाला आहे, की कित्येक शतकांत त्यांच्यामध्ये एकही महापुरुष जन्मला नाही.परंतु प्राचीन काळची तीन राष्ट्र अद्याप जगली आहेत;जगली आहेत एवढेच नव्हे,तर मानवी संस्कृती व सुधारणा यांवर प्रभावी परिणाम ती सारखी करीत आहेत; आजही करून राहिली आहेत.कोणती ही तीन राष्ट्रे ? चिनी लोक,हिंदू लोक व ज्यू लोक यांची राष्ट्रे.ही तीन राष्ट्र का बरे टिकली?आपण याचे कारण पाहू तर आश्चर्यकारक शोध लागेल.आपणास असे दिसून येईल की,हिंदू,चिनी व ज्यू या लोकांनी निराळ्याच प्रकारच्या वीरपुरुषाला वंदनीय ठरविले,वीरत्वाचा,

विभूतिमत्वाचा निराळाच आदर्श त्यांनी मानला.युद्धवीर दूर करून ज्ञानवीराला त्यांनी पूजिले.तलवार गाजवणाऱ्यापेक्षा नवीन हितकर विचार देणाऱ्या महापुरुषाला त्यांनी श्रेष्ठ मानले.हे लोकही त्यांच्या आरंभीच्या इतिहासकाळी कमी युद्धोत्सुक होते असे नाही.त्या काळात जगातील अन्नाचा साठा फार कमी असे.स्वतःचा भाग मिळावा म्हणून सर्वांना निकराने लढावे लागे. परंतु लवकरच या तीन लोकांत असे पुरुष जन्माला आले,की जे शांतीचे स्वप्न रंगवू लागले.आसपास विजिगीषू अशा महत्त्वाकांक्षी युद्धोत्सुक राष्ट्रांचा गराडा असता या लोकांत असे महापुरुष जन्मू लागले,की जे शांतिधर्माविषयी बोलत; शांतीचा संदेश देत; शांतीचा स्वप्ने बघत.चीनमध्ये कन्फ्यूत्सी (कन्फ्यूशियस) व लाओत्सी झाले.भारतात बुध्द व महावीर जन्मले.ज्यू लोकांमध्ये ॲमास,इसैय्या वगैरे कितीतरी शांतिदूत झाले.या पुरुषांनी आपापल्या देशवासियांच्या हृदयात नवीन उदार आशा-आकांक्षा ओतल्या.त्यांनी तिथे शांतीची इच्छा व प्रेरणा रुजविली.स्वतःजगा आणि दुसऱ्यालाही जगू द्या;नांदा व नांदवा,हा त्यांचा संदेश होता.शांतीचे प्रेषित ज्या या तीन राष्ट्रांनी दिले,तीच राष्ट्र अद्याप जिवंत आहेत;केवळ मेल्याप्रमाणे जगत नसून त्यांच्यात आध्यात्मिक सामर्थ्य व तेज अद्याप तळपत आहे.त्यांचा तो वैचारिक व अंतरिक जोम अद्याप आहे.

युद्धप्रिय राष्ट्रांनी स्वतःच स्वतःला खच्ची करून जणू घेतले; स्वतःची शक्ती नष्ट करून ती मातीत गाडली. हिंदू,चिनी व ज्यू लोकांनी स्वतःची शक्ती वाया जाऊ दिली नाही.म्हणून अद्याप ही राष्ट्र नीट उभी आहेत.नाना विरोध व आपत्ती आल्या. नाना कठीण प्रसंगांतून त्यांना जावे लागले, प्रचंड लाटा आल्या व ही राष्ट्रे गिळंकृत केली जाणार,असे वाटले.परंतु नाही,ही राष्ट्र टिकली एवढेच नव्हे;तर आजही सन्यत्सेन,वर्गसाँ व आईन्साटाईन,गांधी व टागोर अशी महान माणसे या राष्ट्रांनी दिली आहेत.


राष्ट्राच्या जीवन-मरणाचा एक निश्चित नियम आहे,असे म्हणावेसे वाटते..हा नियम थोडक्यात पुढीलप्रमाणे सांगता येईल;ज्या राष्ट्राचे जीवन दीर्घतम असते ती पृथ्वीवरची अत्यंत शांतीप्रधान राष्ट्रे असतात.म्हणजेच दुसऱ्या शब्दांत असे म्हणता येईल,की जी राष्ट्रे रणवीरांना सोडून विचारवीरांना व ज्ञानदेवांना भजतात,ती राष्ट्र तरतात.


जगातील महान प्रेषितांपैकी पहिल्याने होऊन गेलेल्यांत मूसा (मोझेस) हा आहे.मूठभर अर्धवट रानटी गुलांमांना त्याने जवळ घेतले;व त्यांना धर्म दिला.आणि त्यांची अशी एक प्राणमय संघटना बनविला,

की तिच्यामुळे आज तीन हजार वर्षे लोटली,तरीही ज्यू समाज टिकला आहे;व आणखी तीन हजार वर्षे लोटली तरी टिकेल,असे म्हणायला हरकत नाही.


मूसा झालाच नाही,असे कोणीकोणी म्हणतात. होमर झाला नाही,ख्रिस्त झाला नाही, शेक्सपीअर झाला नाही.असेही म्हणणारे काही आहेत.जगातील महापुरुषांचा अर्थ ज्यांना समजत नाही असे क्षुद्र लोक असे महापुरुष झालेच नाहीत असे म्हणून मोकळे होतात. म्हणजे मग त्या महापुरुषांच्या जीवनाचा अर्थ समजून घेण्याची वा समजून देण्याची गरजच उरत नाही.ईश्वराने जर खरोखर मूसाला जन्माला घातले नसेल तर त्या काल्पनिक मूसाला निर्मून जुन्या बायबलाच्या निर्मात्यांनी ईश्वराला त्याची चूक पटवून दिली हे बरे केले.त्या प्राचीन ज्यूंना एकत्र आणू शकणाऱ्या महापुरुषाची नितांत आवश्यकता होती.त्यांचे राष्ट्र बनवणारा राष्ट्रपुरुष त्यांना हवा होता.आणि हे महान कार्य ज्याने यशस्वी रीतीने पार पाडले,तो हा मूसा होय.हा मूसा खरोखरच,हाडामांसाचा असा इजिप्तमध्ये जन्मलेला असो,वा लोकांच्या हृदयात विराजमान असणारी ही एक काल्पनिक विभूती असो; ज्यूंच्या हृदयातील हा मूसा त्यांना निराशेच्या रानावनातून पुन्हापुन्हा नवीन देवांकडे नेतो. नवीन नवीन आशा त्यांना देतो;नवीननवीन कर्मे त्यांना करायला लावतो.


मूसा ही काल्पनिक व्यक्ती असली,तरी ज्यूंचा भवितव्याला तिने प्रत्यक्ष झालेल्या एखाद्या मूसा व्यक्तीपेक्षा कमी वळण दिले आहे असे नाही. काल्पनिक वा सत्यमय अशा या मूसाने ज्यूंचे भवितव्य बनविले आहे.ज्यूंच्या भवितव्यावर त्याने अपरंपार परिणाम केले आहेत, इतिहासातील खरीखुरी एक व्यक्ती या दृष्टीने त्याच्याकडे आपण पाहू या.


जुन्या करारातील कथेप्रमाणे,ज्यू आईबापांच्या पोटी मूसा जन्मला;परंतु एका इजिप्शियन राजकन्येने स्वतःचा मुलगा म्हणून त्याला वाढविले.राणी नील नदीवर स्नानास गेली होती. त्या वेळेस तिला हा बाळ पाण्यावर तरंगताना आढळला.तिने तो राजवाड्यात आणला.


ही कथा जरा काल्पनिक वाटते.ज्याची जन्मकथा अशा असंभाव्य गोष्टीत गुरफटलेली आहे.असा मूसा हा इतिहासातील पहिलाच मनुष्य नव्हे, सुमेरियन लोकांचा राजा पहिला सारगान हासुद्धा नदीतील एका नावेत आढळला,अशी गोष्ट आहे.राजघराण्यातील अविवाहित स्त्रिया आपल्या मुलांची जन्मकथा अशा चमत्कारांनीच सांगत असत.जणू ती पद्धत पडून गेली होती..


गोष्ट बहुधा अशी असावी,की ज्यू पुरुषापासून इजिप्शियन राजकन्येला हा बाळ झाला असावा. मूसाचा हा असा आकस्मिक जन्म झाला. इजिप्शियन व ज्यू दोघांनाही या बाळाची जन्मकथा लपविण्याची इच्छा असणे स्वाभाविक होते.म्हणून जुन्या करारात अशी ही कल्पनारंजित कथा सांगितली गेली.



परंतु हा सारा तर्क आहे.काही असो.मूसाचे आईबाप कोण होते,हा प्रश्न काही महत्त्वाचा नाही.त्याच्या अंगात ज्यू रक्त होते ही गोष्टी खरी, इजिप्शियन राजपुत्राप्रमाणे तो वाढविला गेला हेही खरे,या दोन बाबींत एक मेळ आहे.

त्याचे मूसा हे नावही इजिप्शियन आहे.मूसा या शब्दाचा अर्थ अमक्या अमक्याचा मुलगा असा आहे.मूसाचा स्वभावही अगदी ज्यू होता.


मूसाच्या बालपणीची फारशी माहिती नाही. धर्मोपदेशकाचे शिक्षण त्याला देण्यात आले होते.लहान वयातच थोर राजा अखनटन याच्या शिकवणीशी त्याचा परिचय झाला.अखनटन हा इजिप्तचा शहाणा राजा एकेश्वरीमताचा त्याने शोध लावला होता.लोक त्याला वेडा मानीत.मूसा वयाने मोठा झाला.हेलिमोपॉलिस (म्हणजे सूर्याचे शहर) येथील धर्ममंदिरात शिक्षणार्थ तो जाई.तो दाढीमिशा काढी.चेंडूचे खेळ खेळे. विद्यार्थ्यांच्या मंडळांत भाग घेई.तो लवकरच एक मातब्बर इजिप्शियन सरदार झाला असता. मेल्यावर सुंदरशा मातीत (शवपेटिकेत) त्याचा देह मसाल्यात.घालून ठेवला गेला असता.परंतु मुसा बंडखोर होता.तो ज्यू होता.


खालच्या वर्गाच्या लोकांत तो जाऊ येऊ लागला. त्यांच्या भिकार वस्तीत बसू उठू लागला. शहरातील इमारतींना लागणाऱ्या विटा भाजणाऱ्या मजुरांजवळ खरोखरच तो बोलत बसे.या श्रमजीवी लोकांजवळ बोलणे त्याला आवडू लागले.बरे आहेत हे लोक,असे त्याला वाटले.

इजिप्शियन लोकांचा जसा इतिहास होता, तसा यांचाही इतिहास होता.त्यांच्यातही मोठमोठे लोक होऊन गेले होते.त्यांच्या इतिहासातही सुवर्णक्षण येऊन गेले होते.हे लोक मूसाला म्हणाले,थोर अब्राहम आमचा पूर्वज,त्याने ऊर हे खाल्डियन शहर सोडले.स्वातंत्र्याचा शोध करीत तो निघाला.त्याने समुद्र व वाळवंट यांच्यामध्ये एका प्रदेशात हे नवीन स्वातंत्र्य स्थापिले.काही काळ अब्राहम व त्याचे अनुयायी तिथे राहिले. गुराढोरांची त्यांची खिल्लारे वाढली.शेळ्यामेंढ्या वाढल्या.ते सुखी व संपन्न झाले.परंतु ज्यू म्हणजे अज्ञात व अस्थिर लोकांचे राष्ट्र.स्वस्थ बसणे त्यांना माहीत नाही.एका देशातून दुसऱ्या देशात असे करीत सर्व पृथ्वीवर भटकणे,हेच जणू त्यांच्या नशिबी आणि आता आम्ही या इजिप्शियन राजाच्या राज्यात आलो आहोत. आम्ही आज दास झालो आहोत.तरीही थोर पूर्वजांचा आम्हाला अभिमान वाटतो.


ज्यू लोक त्यांचा इतिहास याचे मूसाला आकर्षण वाटले.

तो या ज्यू श्रमजीवींना भेटायला वरचेवर जाऊ लागला.

मूसाची ही विचित्र वर्तणूक पाहून त्याचे पांढरपेशे प्रतिष्ठित मित्र त्याची गंमत करीत.परंतु पुढेपुढे त्याच्या या वर्तनाचा ते धिक्कार करू लागले.त्यांना ते बिलकूल पसंत नव्हते.

त्या असंस्कृत व परकी सेमिटिक भुक्कडांकडे जात जाऊ नकोस,असे राजाने मूसाला बजावले.मानवजातीची कथा,हेन्री थॉमस,अनुवाद-साने गुरुजी,मधुश्री पब्लिकेशन


परंतु मूसाने या धमक्यांकडे व सूचनांकडे लक्ष दिले नाही.एकदा हे ज्यू गुलाम काम करीत असता मूसा तिथे गेला होता.एक इजिप्शियन सरदार एका गुलामाला निर्दयपणे फटके मारीत होता.मूसा संतापला.त्याने इजिप्शियानावर प्रहार केला व त्याला तिथल्या तिथे ठार केले.एका ज्यू गुलामाची बाजू घेऊन इजिप्शियन ठार करणे म्हणजे अक्षम्य अपराध होता.मूसाला प्राणरक्षणार्थ वाळवंटात पळावे लागले.


उर्वरित शिल्लक भाग…पुढील भागात


तळटीप - दिनांक - १५.०७.२४ या दिवशी प्रसारित झालेला प्लेटोचा संदर्भ / A reference to Plato हा लेख पाश्चिमात्य तत्त्वज्ञानाची कहाणी,साने गुरुजी,इंद्रनील प्रकाशन कोल्हापूर या पुस्तकातील आहे.


१५/७/२४

प्लेटोचा संदर्भ / A reference to Plato

युरोपच्या नकाशाकडे नजर फेका,भूमध्य समुद्रात आपली वाकडी बोटे लांबवणारा ग्रीसचा कृश हात तुम्हाला दिसेल.ग्रीसच्या दक्षिणेस महान् क्रीट बेट आहे.या बेटापासून ख्रिस्तपूर्वीच्या दुसऱ्या सुवर्णयुगात संस्कृती व सुधारणा यांना आरंभ झाला.

त्याला ग्रीसच्या देशाने घट्ट पकडून जिंकून घेतले.या बेटापासूनच ख्रिस्तपूर्व दुसऱ्या सुवर्णयुगात ग्रीसने संस्कृती सुधारणा यांना पकडून हस्तगत केले.पूर्वेकडे ईजिप्तसमुद्राचे पलीकडे आशिया मायनर आहे.

आशिया मायनर आज शांत व स्वस्थ दिसले तरी एकेकाळी ते चैतन्याने मुसमुस होते. प्लेटोच्या पूर्वकाळात उद्योगधंदे, व्यापार व मुक्त विचार या सर्वांनी आशिया मायनर चैतन्याने सळसळत होते.

पश्चिमेस पलीकडे इटली उभा आहे.तो जणू समुद्रातील स्तंभ,झुलता मनोरा आहे आणि सिसिली व स्पेनही पश्चिमेसच आहेत.या भागांतून ग्रीकांच्या भरभराटीस आलेल्या वसाहती होत्या आणि सर्वांच्या पलीकडे ज्याला आपण जिब्राल्टर म्हणतो ते हरक्युलिसचे खांब उभे आहेत.जिब्राल्टरच्या भव्य भीषण जबड्यातून पलीकडे जावयास फारसे प्राचीन खलाशी धजत नसत आणि उत्तरेस माणसाळलेले अर्धवट रानटी असे थिसली, एपिरस व मॅसिडोनिया वगैरे भाग होते.या भागातूनच होमर व पेरिक्लीस या ग्रीसांच्या काळातील प्रज्ञावंत पुरुषांच्या पूर्वजांच्या टोळ्या ग्रीसमध्ये आल्या होत्या.


पुन्हा या नकाशाकडे नीट पहा.समुद्राचा ठायीठायी फाटलेला दंतुर किनारा तुम्हास दिसेल व जमिनीचे चढावही दिसतील. जिकडे तिकडे आखाते,भूशिरे आणि आत शिरलेला सागर.समुद्र व जमीन जणू पर्वत व टेकड्या यांच्यात ठेचकाळत आणि हेलकावे खात आहे.समुद्र व जमीन यांच्या या नैसर्गिक अडथळ्यांमुळे ग्रीस देशाचे अलग अलग असे अनेक तुकडे पडले होते.त्या काळात प्रवास व दळणवळण करणे आताच्या मानाने फारच कठीण व दगदगीचे असे.म्हणून प्रत्येक दरी आपापले स्वतंत्र आर्थिक जीवन निर्माण करीत असे व स्वयंपूर्ण होण्याचा प्रयत्न करीत असे.त्या त्या भागात प्रत्येकाने स्वायत्त सरकार,स्वतःच्या स्वतंत्र संस्था,त्यांची विशिष्ट बोली भाषा, विशिष्ट धर्म व संस्कृती वगैरेंची निर्मिती होत असे.प्रत्येक भागाचा असा अलग अलग विकास होई.त्या त्या स्वतंत्र भागात एक दोन मोठी शहरे असत व त्यांच्याभोवती डोंगर उतरणीवरून पसरलेली शेतजमीन असे.ही शेतजमीन संपली की,दुसऱ्या स्वतंत्र भागाची शेतजमीन सुरू होई.

इयुबा,लोक्रिस,इटोलिया,फोसिस,बोटिया,अकिया,

अर्गोलिस,एलिस,मेसेनिया आणि लॅकोनिया,स्पार्टा आणि अत्तिका आणि त्याचे अथेन्स अशी अनेक नगरराज्ये विखुरलेली होती.


आणि अखेरची पुन्हा एकवार दृष्टी फेका आणि त्यातील अथेन्सचे स्थान नीट पहा. ग्रीसच्या मोठ्या शहरांच्या अती पूर्वेस ते आहे.आशिया मायनरच्या भरभराटलेल्या शहरांशी दळणवळण ठेवण्यासाठी अथेन्सच्या दरवाज्यातून जाणे सोयीचे पडे. आशिया मायनरमधील जूनी शहरे ग्रीस देशांतील विकास पावणाऱ्या शहरांना येणाऱ्या जाणाऱ्या रहिवाशांच्या द्वारा आपल्या ऐषआरामाच्या वस्तू तर पाठवीतच; परंतु आपली संस्कृतीही पाठवीत असत. आशिया मायनरमध्ये एक फार सुंदर बंदर होते,याचे नाव पिरस.समुद्राच्या प्रक्षुब्ध पाण्यापासून शकडो गलबते या बंदरात निवारा घेऊ शकत.तसेच या शहराजवळ भलामोठा आरमारी ताफाही होता.


ख्रिस्तपूर्व ४९० ते ४७० या काळात स्पार्ट व अथेन्स परस्परांचे हेवेदावे विसरून एक झाली.डरायस व झर्सिस हे ग्रीक लोकांस गुलाम करू पहात होते.

आशियायी साम्राज्य वाढवून ग्रीस देशाला आपली वसाहत करू पहात होते.परंतु एकजूट झालेल्या अथेन्स व स्पार्ट यांच्या सैन्याने त्यांचे हेतू विफल केले. तरुण नवजवान व युरोपचा वृद्ध आशियाशी हा सामना होता.या युद्धात स्पार्टाने सैन्य पुरविले व अथेन्सने आरमार दिले.युद्ध संपले.स्पार्टाने आपल्या सैन्यास रजा दिली. स्पार्टात एकप्रकारची आर्थिक अव्यवस्था माजली.युद्धानंतर सर्वत्रच तसा अनुभव येतो.परंतु अथेन्सने मात्र आपल्या आरमाराचे व्यापारी काफिल्यात रूपांतर केले.लढणारी गलबते व्यापार करू लागली.अथेन्स हे प्राचीन जगातील सर्वांत महत्त्वाचे असे व्यापारी शहर बनले स्पार्टा पुन्हा शेतीभाती करू लागले व एका बाजूस पडले.त्याची वाढ खुंटली.परंतु अथेन्स गजबजले.व्यापार वाढला.बंदर वाढले.शेकडो जातिजमातीचे, नाना वंशाचे लोक,येथे एकत्र येत,भेटत, बोलत.विविध मानवांचे हे मीलनस्थान झाले. नाना प्रकारच्या चालीरीती,नाना संस्कृती, नाना विचार यांचा संबंध येऊ लागला.या संबंधांमुळे व स्पर्धांमुळे तुलना करण्याची प्रवृत्ती बळावली.लोक पृथक्करण व विचार करू लागले.


जेथे अशी मिळणी होत असते,तेथे परंपरा, रूढी,

समजुती व आग्रही मते ही एकमेकांवर घासून शेवटी काहीच उरत नसते.जेथे हजारो पंथ व संप्रदाय असतात तेथे त्या सर्वांविषयी एकप्रकारची साशंकवृत्ती व अंधश्रद्धा उत्पन्न होते.बहुधा व्यापारी हे पहिले नास्तिक असावेत.त्यांनी इतके पाहिलेले असे की,त्यांची फारशी कशावर श्रद्धा उरतच नसे आणि व्यापाऱ्यांची सर्वसाधारण प्रवृत्ती जगातील लोक ठक तरी असतील नाहीतर मूर्ख तरी असतील असे मानण्याची असल्याने प्रत्येक धर्माबद्दल ते साशंक असत.प्रत्येक पंथ व संप्रदाय याविषयी ते प्रश्न करीत.

या व्यापाऱ्यात आस्ते आस्ते विज्ञानही वाढू लागले.

विनिमयाचे व्यवहार अधिकाधिक गुंतागुंतीचे होऊ लागल्यामुळे गणित वाढले.समुद्रप्रवास अधिक धाडसाचा होऊ लागल्यामुळे खगोल विद्या वाढली. संपत्ती वाढल्यामुळे फुरसत व सुरक्षितता आली आणि त्यामुळे शोधबोधास अनुकूल परिस्थिती उत्पन्न झाली.अशा काळातच तत्त्वज्ञाते जन्मतात.चिंतेन-मनन सुरू होतात. आता समुद्रावरून जाताना दिग्दर्शन करा एवढेच ताऱ्यांना विचारून माणसे स्वस्थ बसतानाशी झाली,तर या विश्वाच्या कोड्याचे उत्तर द्या अशीही मागणी ते ताऱ्यांजवळ करू लागले.

आरंभीचे ग्रीक तत्त्ववेत्ते खगोलशास्त्रज्ञ होते.

ॲरिस्टॉटल म्हणतो, मिळालेल्या सिद्धीमुळे ग्रीकांना अभिमान वाटून ते अधिक पुढे जाऊ लागले. इराणजवळ झालेल्या लढ्यानंतर सर्व क्षेत्रांत ग्रीक पुढे सरसावू लागले.संपूर्ण ज्ञानाचा प्रांत ते आपला मानू लागले.त्यांची बुद्धी सर्वत्र संचरू लागली.

उत्तरोत्तर अधिक व्यापक व विशाल अध्ययन होऊ लागले.पूर्वी घडामोडी अतीमानवी शक्तीने होतात असे वाटे,त्याची कारणमीमांसा ते धैर्याने करू लागले.निरनिराळ्या घडामोडी व गोष्टी यांचे नैसर्गिक पद्धतीने स्पष्टीकरण ते विचारू लागले. जादुटोणे व धार्मिक कर्मकांड यांचे स्तोम हळूहळू कमी होऊन विज्ञान व त्याद्वारे नियंत्रण यांना स्थान मिळू लागले;

तत्त्वज्ञानास आरंभ झाला.


आरंभी हे तत्त्वज्ञान सृष्टिज्ञानात्मक होते.या भौतिक जगाकडे दृष्टी फेकून या सर्व वस्तूजातीचे अंतिम आणि अविच्छेद्य घटक कोणते याचा तपास तत्त्वज्ञानाने सुरू केला.या सर्व विचारांचे पर्यवसान म्हणजे डेमॉक्रिटसचा भौतिकवाद


(डिमॉक्रिटस ख्रि.पू.४६० ते ३६०) डेमॉक्रिटस म्हणे,वस्तूतःदोनच तत्त्वे उरतात.अणू व अवकाश.

ग्रीकांच्या तात्त्विक विचारातील हा एक महत्त्वाचा प्रवाह होता.प्लेटोच्या काळी हा प्रवाह जरा लुप्त झाल्यासारखा वाटला. परंतु एपिक्युरसच्या काळात पुन्हा वर आला (एपिक्युरसचा काळ ख्रि.पू. ३४२ ते २७०); आणि या प्रवाहाचे मोठ्या प्रचंड घवघवीत नदीमध्ये ल्युक्रेशियसच्या काळात रूपांतर झाले.(ल्युक्रेशियसचा काळ खि.पू. ९८ ते ५५),परंतु ग्रीकांचे सर्जक विचारदर्शन सोफिस्टांकडून झाले.सोफिस्ट म्हणजे प्रज्ञानाचे फिरते आचार्य.या बाह्य वस्तुमानाकडे पाहण्याऐवजी ते अंतर्मुख होऊन स्वतःचे विचार व स्वतःची वृत्ती यांचा विचार करीत.हे फार हुशार लोक होते. (उदाहरणार्थजॉर्जियास व हिप्पियाज) यापैकी काही काही फार खोल विचार करणारे होते.उदा.प्रोटॅगोरस,प्रॉडिकस.आजच्या अर्वाचीन तत्त्वज्ञानात मनाचा व वर्तनाचा असा एकही प्रश्न किंवा उत्तर नाही की,जे त्या लोकांना जाणवले नाही व ज्याची त्यांनी चर्चा केली नाही.

आजचे नीतिशास्त्र व आजचे मानसशास्त्र, आजचे तत्त्वज्ञान व आजचे जीवनाचे प्रश्न या सर्वांचे पडसाद त्या सोफिस्ट लोकांच्या विवेचनांत दिसून येतात. हे सोफिस्ट कोणत्याही गोष्टींबद्दल प्रश्न करीत.धार्मिक व राजकीय विधिनिषेधांची ते पर्वा करीत नसत.ते निर्भयपणे सर्व प्रश्नांची चर्चा करीत.बुद्धीच्या सिंहासनासमोर प्रत्येक पंथ,संस्था व मत आणून ते उभे करीत. शासनविषयक क्षेत्रात त्यांच्यात दोन पक्ष होते.एक पक्ष रूसोप्रमाणे जे स्वाभाविक आहे ते चांगले आहे,सारी सुधारणा वाईट आहे असे म्हणे.

निसर्गतः सारी माणसे समान असतात परंतु वर्गनिर्मित संस्थांमुळे माणसात विषमता उत्पन्न होते.कायदा ही वस्तू बळवंतांनी निर्मिली आहे,

दुबळ्यांवर सत्ता चालविण्याचे ते साधन आहे.असे त्याचे मत होते.आणखी एक पक्ष होता,त्याचे नीत्शेप्रमाणे मत होते.निसर्ग हा सद्सताच्या पलीकडे आहे.त्याच्यामते स्वभावतःसारी माणसे असमानच असतात.बळवंतांना मर्यादा घालण्यासाठी,त्यांनाना रोखण्यासाठी दुबळ्यांनी नीतिशास्त्र निर्मिले आहे. 


बलशाली होणे हा मानवाचा सर्वोत्कृष्ट सद्‌गुण होय;मानवाची हीच खरीखुरी इच्छा असते.

शासनाच्या सर्व प्रकारात अत्यंत शहाणपणाचा व स्वाभाविक प्रकार म्हणजे नबाबशाही,अमीरशाही ही होय.लोकशाहीवर हा जो हल्ला अथेन्समध्ये सुरू झाला त्याचे कारण काय बरे होते?अथेन्स शहरात श्रीमंतांचा एक अल्पसंख्य वर्ग वाढत होता,उदयास येत होता.हा पक्ष स्वतःला अल्प लोकसत्ताकं राज्यपद्धतीचा पुरस्कर्ता म्हणवी.लोकशाहीत राम नाही,लोकशाही कुचकामी आहे,कार्यक्षम नाही,असे ते म्हणत.खरे पाहता अथेन्समध्ये फारशी लोकसत्ता नव्हती की जिला नावे ठेवावी. अथेन्सच्या ४ लाख लौकांपैकी अडीच लक्ष गुलाम होते.त्यांना कोणत्याही प्रकारचा राजकीय हक्क नव्हता.जे दीड लाख स्वतंत्र नागरिक उरले,त्यांच्यापैकी फारच थोडे सर्वसामान्य सभेला उपस्थित रहात. एक्लेशिया या सर्वसामान्य सभेत राज्याचे सारे धोरण आखण्यात येई,चर्चिले जाई. परंतु जी काही लोकशाही तेथे होती,ती एकप्रकारे परिपूर्ण होती.


इतकी परिपूर्ण लोकसत्ता कुठेही आपणास दिसणार नाही.सर्वश्रेष्ठ अधिकारी मंडळाला डिकास्टेरिया (Dikasteria) म्हणत.यात जवळजवळ एक हजार लोक त्यांच्या यादीतून आद्याक्षराप्रमाणे घेतले जात. लोकशाहीचे शत्रू म्हणत की,अशी,इतकी परिपूर्ण आणि तरीही विरोधकांच्याच मते तितकीच हास्यापद लोकशाही अन्यत्र क्वचितच कोठे असेल.


ख्रिस्तपूर्व ४३० ते ४०० पर्यंत जी पेलोपोनेशियन लढाई एक पिढीभर सारखी चालली होती तीत स्पार्टाने अथेन्सची आरमारी सत्ता शेवटी नष्ट केली.

त्यामुळे क्रिटियाज ज्याचा नेता होता.अशा अथेन्समधील मूठभर वरिष्ठ वर्ग म्हणू लागला की,लोकशाही कुचकामी आहे.लोकशाहीमुळे आपणास युद्ध यशस्वीरित्या करता आले नाही.हे श्रीमंत अथेनियन स्पार्टातील वरिष्ठ वर्गाच्या सत्तेची गुप्तरीतीने स्तुती करीत.अथेन्समधील अल्पसंख्याची सत्ता असावी असे म्हणणाऱ्यांमध्ये बरेचसे पुढारी हद्दपार केले गेले.परंतु जेव्हा अथेन्स स्पार्टाला शरण गेले व शेवटी तह झाला तेव्हा त्या तहात अशी एक अट होती की,हद्दपार झालेले बडे लोक परत बोलविले जावेत.ते अथेन्समध्ये आले व त्यांनी लगेच वरिष्ठ वर्गाचे बंड पुकारले.


क्रिटियाज त्यांचा पुढारी होता.राष्ट्राची दुर्दशा करून टाकणाऱ्या लोकशाही सत्तेविरुद्ध त्यांचा हा उठाव होता.परंतु श्रीमंतांची ही क्रांती अपयशी झाली. क्रिटियाज रणांगणी धारातीर्थी पडला.हा क्रिट्यीज सॉक्रेटिसचा शिष्य होता;प्लेटोचा चुलता होता.

१३/७/२४

झाडांची शाळा / School of Trees

झाडांना आपली भूक कधीही भागवता येते, पण तहानेचं मात्र तसं नसतं,त्यामुळे भुकेपेक्षा त्यांच्यासाठी तहान अधिक त्रासदायक असते.ज्याप्रमाणे एखाद्या ब्रेडच्या भट्टीमध्ये ब्रेड कधीही बनू शकतो तसंच भूक लागली की झाडांना खाद्य बनवता येतं.पण बेकरीत पाणी नसलं तर ब्रेड बनत नाही त्याप्रमाणे पाण्याशिवाय झाडंही खाद्य बनवू शकत नाहीत.


जेव्हा पाणी उपलब्ध असतं तेव्हा एक प्रौढ बीच झाड दिवसाला १३० गॅलन पाणी आपल्या फांद्यांना पोचवत असतं.पण उन्हाळ्यात असं केलं तर मात्र मातीतील आर्द्रता संपून जाते.गर्मीमध्ये रोज पाऊस पडत नाही त्यामुळे माती जरा कोरडीच राहते.म्हणून झाड थंडीमध्ये पाण्याचा साठा करून ठेवतं.थंडीत जेव्हा भरपूर पाऊस असतो तेव्हा झाड पाण्याचा अगदी कमी वापर करतं,कारण या काळात त्याला स्वतःची वाढ करायची नसते. 


जमिनीखालील पाणी आणि झाडामधला साठा यातून त्याची उन्हाळ्याची सोय होणार असते.पण काही वर्षांनी पाण्याची कमतरता जाणवू लागते.

उन्हाळा काही आठवडे जास्त रेंगाळला आणि पावसाने दांडी मारली तर मात्र जंगलावर त्याचा विपरीत परिणाम सुरू होतो.भरपूर आर्द्रता असलेल्या मातीत उगवणाऱ्या झाडांना या गोष्टीचा सर्वाधिक त्रास होतो,कारण त्यांनी पाण्याचा वापर कधीही काटकसरीने केलेला नसतो.पाण्याबाबतच्या अशा उधळ्या सवयीचा फटका विशाल आणि जोमदार असलेल्या वृक्षालाही बसतो.


मी ज्या जंगलाचा सांभाळ करतो तिथे स्प्रूस झाडांना पाणी तुटवड्याचा सर्वाधिक त्रास होतो.जेव्हा जमीन सुकून जाते तरीही त्यांची टोकाकडची सुईसारखी पानं पाणी मागत राहतात तेव्हा या झाडांची कोरडी पडलेली खोडं हा ताण सहन करू शकत नाहीत. आणि त्यांच्या खोडाचं साल फाटू लागतं.तीन फुटांपर्यंत फाटलेल्या सालाची जखम आतपर्यंत पोहोचते आणि झाडाला मोठी इजा करू शकते.याचा फायदा फंगस लगेच घेतात आणि झाडाच्या आतपर्यंत जाऊन आपलं कारस्थान सुरू करतात.

येणाऱ्या काळात स्प्रूस आपली जखम भरण्याचा प्रयत्न करतो,पण साल काही बंद होत नाही. लांबूनही काळा ओघळ येणारी जखम दिसून येते.आणि या चर्चेद्वारे आपण झाडाच्या शाळेत प्रवेश करीत आहोत.(द हिडन लाईफ ऑफ ट्रीज,पी ट र वो ह्ल ले बे न

अनुवाद - गुरुदास नूलकर,अरविंद घनश्याम पाटकर,मनोविकास प्रकाशन)


निसर्ग एक कठोर शिक्षक असल्यामुळे या शाळांमधून अजूनही शारीरिक शिक्षेची पद्धत सुरू आहे. एखाद्या झाडाने सांगितलेले काम केलं नाही तर त्याला त्याची किंमत मोजावीच लागते. 


कुठे लाकूड मोडतं तर कुठे झाडाचा कॅम्बियम नावाचा सर्वांत संवेदनशील जीवनदायी भाग फाटतो.हा कॅम्बियम थर खोडाच्या खाली लागूनच असतो,पण जखम भरणे इतकाच धडा झाडाला मिळत नाही तर यामुळे ते पाण्याचा वापर काटकसरीने करायला सुरुवात करतं.

जमिनीत भरपूर आर्द्रता असली तरीही हे झाड यापुढे पाण्याची उधळपट्टी करणार नाही,कारण पुढे पाणी मिळेल का नाही,काही सांगता येत नाही!हा धडा मिळतो तो जास्त करून भरपूर आर्द्रता असलेल्या जमिनीत उगवणाऱ्या स्प्रूस झाडांना.पण यात काही आश्चर्य नाही. पाण्याच्या मुबलक पुरवठ्यामुळे ते असे खट्याळ झालेले असतात.जेमतेम अर्ध्या मैलावर कोरड्या दगडी भागात उतारावर वाढणाऱ्या झाडांच्यात दृश्य वेगळंच असतं. पहिल्यांदा मला वाटायचं पाण्याच्या अभावाचा सर्वाधिक फटका इथल्या झाडांना बसेल.पण इथं तर चित्र उलटच होतं. तिथल्या उतारावर वाढणारी झाडे पाण्याचा संयमित वापर करून स्वतःला कणखर बनवतात.त्यामुळे ते याहीपेक्षा प्रखर परिस्थितीत तग धरू शकतात.

इथल्या मातीत आर्द्रता कमी राहते कारण सूर्य कडक असतो.तरीही इथले स्प्रूस धडधाकट राहतात.आपली वाढ अगदी संथ करून मिळेल तेवढ्या पाण्यात स्वतःला जिवंत ठेवण्याची कला त्यांना जमलेली आहे.याहून महत्त्वाचा एक धडा झाडांच्या शाळेत शिकवला जातो,तो म्हणजे स्वतःच स्वतःला आधार द्यायला कसं शिकायचं? झाडांना उगाचच गोष्टी अवघड करून ठेवायला आवडत नाही.जर सुदैवाने एखादा धष्टपुष्ट शेजारी मिळाला आणि त्याच्या आधाराने उंच होता आलं तर उगीच स्वतःचं खोड वाढवण्यात ऊर्जा कशाला खर्च करायची? जोपर्यंत दोघेही उभे आहेत तोपर्यंत काहीच भीती नाही.पण मध्य युरोपातील व्यवसायिक लागवडीच्या जंगलात दर थोड्या वर्षांनी झाड कापण्याची यंत्रसामग्री आणली जाते आणि १० टक्के झाडं कापली जातात.नैसर्गिक जंगलात मात्र एखादं वयोवृद्ध वृक्ष वठला की मगच पोकळी निर्माण होते.अशा वेळेस आधार गेला की आधार घेणारं झाड अचानक अस्थिर होऊ लागतं.मग स्वतःची मजबुती वाढवत ते स्वतःचाच आधार बन्नू लागत.झाडांच्या वाढीचा वेग अत्यंत संथ असल्यामुळे पुन्हा स्थिरता यायला तीन ते दहा वर्षे लागू शकतात.


आधार कसा मिळवावा,या शिक्षणात वाऱ्याचीही भूमिका असते.वाऱ्याने झाड एकदा या बाजूला तर एकदा त्या बाजूला वाकवलं जाते.त्यामुळे खोडाला सूक्ष्म छेद जातात.आणि ज्या बाजूला जास्त भार पडतो तिथे झाडाला खोडातील ताकद वाढवावी लागते.हे करण्यासाठी भरपूर ऊर्जा लागते मग वृक्षाच्या वाढीसाठी लागणारी ऊर्जा इकडे वळवावी लागते.ताकदीचा उपयोग पुढे वाढण्यात कामी येतो. शेजाऱ्याचा आधार गेला की झाडाला थोडंसं जास्त ऊन मिळू लागतं,हा थोडा फायदा होतो पण हा फायदा घ्यायलाही अनेक वर्षं लागतात.कारण आजपर्यंत झाडाची पानं कमी सूर्यप्रकाशासाठी अनुकूल झालेली असतात,ती नाजूक आणि प्रकाशाला संवेदनशील असतात.आता अचानक लख्ख सूर्यप्रकाश मिळाल्यावर त्यांना चटके बसतात.

झाडांवर नवीन पालवीचे अंकुर आदल्या वर्षीच्या वसंत ऋतूतच तयार होऊन गेलेले असतात.

त्यामुळे पानझडी झाडाला जास्त सूर्यप्रकाशाचा फायदा घेण्यासाठी किमान दोन ऋतूंची वाट पाहावी लागते. सूचीपर्णी झाडांना तर यापेक्षा अधिक वेळ लागू शकतो कारण त्यांची सुयांसारखी पाने जवळजवळ दहा वर्षांपर्यंत फांद्यांवर राहतात.

जोपर्यंत सर्व पानं किंवा सूचीपर्णी झाडांची पालवी बदलत नाही तोपर्यंत परिस्थिती जरा गंभीरच असते.

खोडाच्या घेराची वाढ सुरू असेपर्यंत आणि स्थैर्य मिळेपर्यंत झाडाला अनेक छोटी-मोठी दुखणी आणि इजा सहन कराव्या लागत असतात.नैसर्गिक जंगलांमधल्या झाडाच्या आयुष्यात हे असं अनेक वेळा होणार असतं.वठलेल्या झाडांमुळे आच्छादनात पडलेली खिंडारं एकदा का झाडांनी आपली छत्री वाढवून भरून काढली,की मगच पुन्हा एकमेकांचा आधार घेत वाढणं शक्य होतं. आणि असं झालं की खोडाचा घेर वाढवण्यापेक्षा उंची वाढवण्यासाठी झाड अधिक ऊर्जा खर्च करतं.पण परत आपण झाडांच्या शाळेकडे येऊ या.जर झाडांना शिकण्याची कला जमत असेल,जसं आपण आत्ता अनुभवलं,तर मग असा प्रश्न पडतो की या शिक्षणाची नोंद कुठल्या अवयवात होते? मिळालेले ज्ञान,अनुभव कुठं साठवलं जातं? त्यांना आकडेवारी साठवण्यासाठी किंवा त्यावर काही प्रक्रिया करण्यासाठी मेंदू नसतो.हे सगळ्या झाडांच्या बाबत असंच असतं.त्यामुळे शास्त्रज्ञांना प्रश्न पडतो की खरंच झाडांना शिकण्याची कला अवगत आहे का? परत एकदा ऑस्ट्रेलियन शास्त्रज्ञ मोनिका गॅगलियानोचा अभ्यास इथे आपल्याला दिशा दाखवतो.


या शास्त्रज्ञ मिमोसास (लाजाळू) नावाच्या सूक्ष्म संवेदनशील वनस्पतींचा अभ्यास करीत आहेत.मिमोसास या उष्ण कटिबंध भागातील वेली आहेत.अभ्यासासाठी ही वनस्पती साजेशी आहे,कारण तिला लगेच चिथवता येते.त्यांना हात लावताच त्यांची इवलीशी पानं स्वसंरक्षणासाठी बंद होतात.गॅगलियानोच्या प्रयोगात या पानांवर ठरावीक वेळेला एक पाण्याचा थेंब पडत राहतो. सुरुवातीला ही सतर्क पानं लगेच बंद होतात, पण काही वेळातच त्यांना लक्षात येतं की या थेंबांपासून आपल्याला धोका नाही.त्यानंतर पानं उघडीच राहतात.यातली सर्वांत आश्चर्यकारक सत्य म्हणजे गॅगलियानोला असं दिसलं की एका आठवड्यानंतरही त्या पानांना हे मिळालेले हे नवं ज्ञान त्यांच्या लक्षात राहिलं होतं. 


बीच किंवा एक सबंध झाड प्रयोगशाळेत नेऊन त्यावर असे प्रयोग करता येत नाहीत, हे किती दुर्दैवी आहे! पण पाण्याच्या बाबतीत मात्र यावर अभ्यास आहे.त्यात असं दिसतं की प्रचंड तहान लागली की झाडे किंचाळू लागतात.तुम्ही जंगलात असाल तर मात्र हे ऐकू येणार नाही कारण हे मानवी श्रवण मर्यादेबाहेरच्या ध्वनिलहरी असतात. स्वीस फेडरल इन्स्टिट्यूट फॉर फॉरेस्ट,स्नो अँड लँडस्केप रिसर्च नावाच्या संस्थेत झाडांच्या ध्वनींचा अभ्यास केला गेला आहे.ते म्हणतात की,जेव्हा मुळाकडून पानांपर्यंत पाण्याचा प्रवाह होत नाही तेव्हा खोडातून कंपन होते.कदाचित हा एक तांत्रिक प्रतिसाद असेल... पण तरीही?


आपल्याला ध्वनी कसा तयार होतो,याची वैज्ञानिक माहिती आहे.मानव ध्वनी कसे काढतात,हे जर आपण सूक्ष्मदर्शिकेतून पाहिलं तर फार काही वेगळं दिसणार नाही. आपल्या श्वासनलिकेतून जेव्हा हवा जाते, त्या वेळेस आपल्या स्वरतंतूंचं कंपन होतं आणि ध्वनी तयार होतो.त्या दृष्टीने मी जेव्हा खोडांच्या या कंपनाचा विचार करतो, खासकरून मागे वर्णन केलल्या रोपट्यांच्या मुळांचा 'तडतडणारा' आवाजाच्या संदर्भात ! मला अशी खात्री वाटू लागली की ही स्पंदनेसुद्धा खोडाकडून मारलेल्या तहानेच्या हाका आहेत.झाड आपल्या मित्रांना ओरडून सांगायचा प्रयत्न करत असतील की पाणीपुरवठा धोक्यात आला आहे.


वाचता..वाचता… वेचलेले..।


रूसोचे पुस्तक स्विस अधिकाऱ्यांनी जाळले हे एकून तो रागावला.कारण विचार स्वातंत्र्याचा तो भोक्ता होता.तो रूसोला लिहिता झाला.


तुम्ही लिहिता त्यातील एका अक्षराशीही मीसहमत नाही परंतु तुम्हाला ते लिहिण्याचा हक्क आहे व त्या हक्काचे मी मरेपर्यंत समर्थन करीन.तुमच्या विचार करण्याच्या व ते व्यक्त करण्याच्या स्वातंत्र्याचे अखेरपर्यंत संरक्षण करीन.


आणि रूसोला जेव्हा कोठे आधार मिळेना, शकडो शत्रू त्याचा पाठलाग करीत होते, त्याला सतावीत होते व रूसो सारखा इकडे तिकडे पळता पळता थकून जात होता.त्यावेळेस व्हॉल्टेअरने त्याला लिहिले.


माझ्या घरी येऊन रहामी तुमचे मनापासून स्वागत करीन. हे दोन महान पुरुष एकत्र राहते तर केवढा चमत्कार झाला असता !


दुखण्यातून सुधारणा होत जाणे यासारख्या गोष्टी झोपेतच होत असतात.निद्रा ही मूळ अवस्थेसारखी असते असे बुर्ताशा जे म्हणाला होता ते त्याचे म्हणणे बरोबर होतेः

गर्भाशायातील जीव सदैव झोपलेलाच असतो;लहान मूल बरेचसे झोपेतच असते.जीवन म्हणजे गमावलेले परत मिळविणे.झोप म्हणजे मरणाचा घास; दिवसाच्या श्रमाने जीवनाचा जो भाग झिजला, श्रमला असतो त्या भागाला पुन्हा तरतरीत करण्यासाठी झोप असते.मरणापासून उसनां घेतलेला हा घास खाऊन ते जीवन पुन्हा तरतरीत होते.निद्रा म्हणजे आपला चिरशत्रू. आपण जागे असतानाही ती थोडीफार आपणाजवळ असते.शेवटी अगदी शहाण्या लोकांच्या डोक्यातही प्रत्येक रात्री अत्यंत चमत्कारिक व अर्थहीन स्वप्नांचा धूमाकूळ चालत असतो.अशा डोक्यांकडून (मेंदूकडून) कशाची अपेक्षा करायची? त्यांना आपल्या स्वप्नांतून जागे झाल्यानंतर पूनःआपले नित्याचे विचार करणे सुरू करावयाचे असते.असे मेंदू अधिक काय करणार? इच्छाशक्ती म्हणजे माणसाचे सारस्वरूप.जीवनाचे ते स्वरूप आहे.जीवन कोणत्याही स्वरूपात असो;निर्जीव सृष्टीही का असेना.

सर्वत्रही जडातही तर तीच संकल्पशक्ती जर भरून राहिली असेल तर मग काय? इतका दीर्घ काल जिचा शोध केला जात आहे,व जिने इतका दीर्घकाल निराश केलेली असेल,अशीच जर ती 'स्वरूप सत्ता' असेल,तीच संकल्पशक्ती जर अंतिम अन्नःसत्ता असेल व सर्व गोष्टींचे तो गुप्त रहस्य असेल तर काय?


प्रत्येक वस्तूत एक अंतःशक्ती आहे,ती त्या वस्तूला आकार देते.झाडे घ्या;ग्रह घ्या; पशुपक्षी घ्या,त्या सर्वांत ती असते व त्यांना आकार देत असते.प्राण्यातील सहजप्रवृत्ती निसर्गात जी सहेतूकता शिल्लक राहिली आहे तिचे हे उदाहरण आहे.जी कृती हेतूच्या प्राप्तीने प्रेरित झालेली म्हणजे सहेतूक असते तशीच सहज प्रवृत्तीही असते;

आणि तरीही ती हेतुविरहित असते.निसर्गातील सर्व रचनानिर्मिती ही हेतुप्रधान कृतीच्या सदृशा असते,आणि तरीही ती हेतुविरहित असते.बुद्धीपेक्षा संकल्पशक्ती किती आधीची,किती पूर्वीची आहे ते प्राण्यांतील आश्चर्यकारक यांत्रिक कुशलतेवरून दिसून येते. 


युरोपातून सर्वत्र हिंडलेला असा एक हत्ती होता. त्याने शकडो पूल ओलांडले होते जरी त्या पुलावरून अनेक माणसे,घोडे जाताना तो बघत होता तरी त्या तकलुपी पुलावरून स्वतः मात्र पुढे जाईना.कारण त्याला आधी तसा अनुभव कधी आलेला नसतो.तर त्याला तसे सहजप्रवृत्तीकडे तसे वाटते. 


ओरँग ऊटँग माकडे कोठे विस्तव दिसला तर त्याच्याजवळ शकत बसतो;परंतु विस्तवात तो जळण नाही घालीत.अर्थातच अशी ही कृत्ये सहजप्रवृत्त असतात,तर्कशुद्ध विचारांचे फलित नसतात.ती बुद्धीची अभिव्यक्ती नसते,तर तो संकल्पशक्तीचा आविष्कार असतो. ही जिजीविषा,अर्थात जगण्याची इच्छा असते. जास्तीत जास्त जीवन जगण्याची इच्छा असते. सर्व जिवंत प्राण्यांना जीवन किती प्यारे असते ! आणि किती धीराने,काही न बोलता,गाजावाजा न करता,धिम्मेपणाने संकल्पशक्ती आपली कालक्रमण करीत असते ! हजारो वर्षे विद्युत तांबे व जस्त यात गाढ झोपून राहिली होती; आणि तांबे व जस्त रूप्याजवळ पडून होती. काही विवक्षित वेळी तिन्ही आणली तर आगीत जळून जातात.

सजीव सृष्टीतही पाहू तर बीज आपल्यामध्ये सर्जनशक्ती सुप्तरूपात तीन तीन हजार वर्षे साठवून पडून राहू शकते;

आणि अनुकुल परिस्थिती येताच ती बी अंकुरते, वनस्पतीच नाही तर बेडूक वगैरे प्राणी सुद्धा हजारो वर्षे दगड धोंड्यात जगू शकतात.म्हणून ही संकल्पशक्ती म्हणजे जगण्याची इच्छा; संकल्पशक्ती असते आणि तिचा सनातन शत्रू म्हणजे मरण असते.परंतु ही संकल्पशक्ती मरणासही कदाचित पराभूत करू शकते का?


प्रत्येक व्यक्तीला आवश्यक इतके दुःखाचे माप तिच्या प्रकृतीने,स्वभावानेच एकदा निश्चित करून टाकलेले असते.तो पेला कधी रिकामा होणार नाही किंवा भरलेला आहे.त्याहून अधिक भरला जाणार नाही... एखादी थोडी भारी चिंता आपल्या छातीवरून दूर झाली तर दुसरी तेथे येऊन बसते.या दुसऱ्या चिंतेचे सारे साहित्य आधीपासून होतो तयार.काळजीच्या स्वरूपात आपल्या जाणिवेत शिरायला तिला जागा नव्हती,परंतु जागा रिकामी होताच ती घुसते बघा आत.बसते सिंहासनावर राणी.


हे जीवन दुरितमय,वाईट आहे,कारण दुःख हेच जीवनाचे मूलभूत यथार्थ स्वरूप आहे. दुःखातूनच प्रेरणा मिळते.Pain is basic stimulus & reality.सुख म्हणजे दुःखाचे केवळ थांबण असते.सुख अनुभवरूप आहे. दुःखाचा अभाव म्हणजे सुख.


ॲरिस्टॉटल म्हणे की,शहाणा मनुष्य सुख नाही शोधीत,तर चिंता व दुःख यातून तो मुक्ती मिळवू पाहतो.त्याचे म्हणणे यथार्थ होते.


पाश्चिमात्य तत्त्वज्ञानाची कहाणी - सानेगुरुजी, इंद्रनिल प्रकाशन,कोल्हापूर


ऑस्ट्रेलियातील बुलडाग मुंगीचे उदाहरण फारच आश्चर्यकारक आहे.तिचे जर दोन तुकडे केले तर त्या दोन तुकड्यांत लढाई सुरू होते,शेपटी व डोळे यांचे युद्ध सुरू होते.डोके दातांनी शेवटीला चावू पाहते तर शेपटी डोक्यात नांगी मारू पाहते व शौर्याने स्वरंक्षण करते.अर्धा तास चालते अशी लढायी,शेवटी दोन्ही तुकडे मरतात,

किंवा दुसऱ्या मुंग्या त्यांना ओढून नेतात.ज्या ज्या वेळेस हा प्रयोग करण्यात आला त्या त्या वेळेस हा झगडा दिसून आला.Yunghahn युंघान एका जावा बेटातील अशी गोष्ट सांगतो.जावा बेटात एक विस्तृत मैदान आहे.त्या मैदानात जिकडे तिकडे हाडे पडलेली आहेत.हे रणक्षेत्र असावे असे मला वाटले.परंतु ही हाडे large turtles (हाडे) मोठ्या कासव प्राण्याची होती... अंडी घालण्याकरीता ते समुद्रातून येथे जमिनीवर येतात आणि नंतर रानकुत्रे त्यांच्यावर हल्ला करतात.ते कुत्रे यांच्या पाठी उलट्या करून त्यांच्यावर बसतात.त्यांच्या पोटापासून लहानसे कवच दूर करून त्यांना जिवंत खाऊन टाकतात. परंतु पुष्कळदा असे होते की,एखादा वाघ या कुत्र्यांवर झडप घालतो.