मूसा आता धनगर बनला.वाळवंटाच्या कडेला असलेल्या ओसाड भागात,डोंगर-पहाडात तो राही.त्याच्या शिक्षणातील नवीन प्रकरण जणू सुरू झाले.
विद्यापीठातील धुळीने भरलेली ती हस्तलिखित सोडून तो बाहेर पडला.मृतांच्या छायामय जीवितांविषयीच्या कल्पना व कथा सोडून तो बाहेर पडला.आता रात्रीच्या वेळेस तो आकाशातील तारे बघे.ईश्वराची ती जळजळीत तेजोमय लिपी आकाशपटावर तो पाही.
इजिप्शियन लोक गाय,कुत्रा वगैरेंनाही देव मानीत.मूसाने ईश्वराविषयींच्या या साऱ्या पोरकट कल्पना आपल्या मनातून काढून टाकल्या.तो निराळा नवा देव शोधू लागला.अधिक उदात्त, भव्य व दिव्य असा परमेश्वर तो पाहू लागला. वाळवंटात उठणाऱ्या वादळांवर स्वार झालेला असा परमेश्वर कधी त्याला दिसे.मेघांच्या गर्जनेत,विजांच्या कडकडाटात त्या प्रभूचा आवाज त्याला ऐकू येई आणि सकाळी सूर्याचे किरण येत,वाळवंटातील झुडपांवर ते किरण पडत;आणि ती झुडपे पेटल्याप्रमाणे दिसत.त्या प्रदीप्त झुडपांत प्रभूचे मुखमंडल जणू तो प्रत्यक्ष समोर पाही.मूसाला नवीन परमेश्वर सापडला. त्या वाळवंटात त्याला नवा देव मिळाला.हा परमेश्वर भयंकर होता.ओसाड रानावनात सापडलेला तो परमेश्वर होता.
अरबी लोकांच्या परमेश्वराप्रमाणे कठोर व उग्र असा हा प्रभू होता. पर्वतांवरून उड्डाण करणारा,वाळवंटातून पार जाणारा.भव्य भडक अशा तंबूत राहणारा,असा हा परमेश्वर होता.लोक झोपले असता त्यांना तो सांभळतो;
त्यांना युद्धात घेऊन जातो;निर्दयपणे आपल्या लोकांच्या शत्रूचा निःपात करतो; वाऱ्याप्रमाणे स्वतःचे मन बदलतो;
मनात येईल तसे करतो;अपमानाचा पटकन् सूड घेतो;खोटे सांगून हेतुसिद्धी होत असेल तर हा देव खोटे बोलायलाही मागे-पुढे पाहत नाही.हा असा देव आहे,की अन्याय ज्याला सहन होत नाही; परकीयांविषयीही तो उदारता दाखवितो,पोरक्या पोरांचा तो प्रेमळ पिता बनतो;गरिबांवर दया करतो.अरबस्तानातील बदाऊनमध्ये जे जे गुण व
दुर्गुण आहेत,ते थोडक्यात या देवाच्या ठायी आहेत.
जणू मूसाने आरशात पाहिले आणि स्वतःच्याच स्वरूपात त्याला परमेश्वर आढळला. मूसाने जिहोवाचे जे चित्र रंगविले आहे, ते त्याचे स्वतःचेच अनंत पटीने वाढवलेले असे चित्र आहे.
मूसा पुष्कळ वर्षे वाळवंटातच राहिला.
वाळवंटातील ती अनंत शांती त्याला आवडे.त्या गंभीर शांतीने मूसाचे विचार वाढले.विचारांचा विकास व्हायला अवसर मिळाला.वाळवंटातील अपार शांती,तेथील ते निःस्तब्ध अनंत आकाश यांच्या संगतीत त्याच्या गूढ स्वभावाला,त्याच्या चिंतनशील मनाला भरपूर खाद्य मिळाले.एका सुखवस्तू बदाऊन सरदाराच्या मुलीशी त्याने लग्न लावले आणि चिंतनशील शांत जीवन तो कंठू लागला.परंतु इजिप्तमध्ये ज्या गुलामांना सोडून आला होता,त्यांच्याविषयीचा विचार त्याला सचिंत करी.आपल्या बदाऊन मित्रांजवळ त्यांच्याविषयी तो बोले.त्यांच्या उज्ज्वल भूतकाळाविषयी व आजच्या अधःपतित स्थितीविषयी तो सांगे.आपल्या या हतपतित बंधूंची करुण-कहाणी ऐकून बदाऊन सहानुभूती प्रकट करीत.
इजिप्तमधील हे लोक त्यांचेच होते. बदाऊनांचाही अब्राहम हाच मूळ पुरुष.ज्या अब्राहमने आपल्या जातीला नवनवे स्थान मिळावे म्हणून सर्व वाळवंटातून धैर्याचे नवतेज पेटवले,तोच अब्राहम अरब बदाऊनांचा व इजिप्तमधील दास्यमग्न ज्यूंचा पूर्वज.
हळूहळू मूसाच्या मनात एक विचार आला. इजिप्तमधील दास्यमग्न ज्यूंनी इकडे पळून यावे; व वाळवंटात स्वतंत्र व्हावे,असे त्याला वाटले आणि नंतर पूर्वजांचे ते पहिले स्थान कनान तिथेही या सर्वांना आपण घेऊन जाऊ असे त्याला वाटले.ज्यूंना त्यांचे पहिले स्थान परत देणे,त्यांची जुनी मातृभूमी त्यांना परत देणे, त्यांना नवधर्म देणे ! किती महनीय उदात्त असे हे ध्येय ! हे भव्यदिव्य स्वप्न मनात खेळवीत मूसा सिनाई पर्वतावर शेळ्या-मेंढ्या चारीत बसे.
याच सुमारास इजिप्तमधील राजा मरण पावला. नवीन राजा गादीवर बसला.इजिप्तमधून पूर्वेकडे येणाऱ्या कारवानांच्या तोंडून तिकडील या घडामोडी मूसाला कळल्या.कृती करायला योग्य संधी आली होती.आणि मूसा पुन्हा इजिप्तमध्ये गेला.तो त्या गुलामांत सर्वत्र हिंडूफिरू लागला. बंड करा असे तो त्यांना सांगू लागला.
कामाची हत्यारे खाली ठेवा.संप करा,काम बंद पाडा. दगड वाहू नका;चढवू नका;विटा भाजू नका. असे तो सांगू लागला.जुलमी धन्याचे काम काय म्हणून करावयाचे ?
इजिप्शियन राजपुत्र असणारा मूसा, अरबस्तानात धनगर होऊन राहणारा मूसा आता इजिप्शियन श्रमजीवींचा बंडखोर पुढारी झाला.इतिहासातील विटा भाजणाऱ्या कामगारांचे पहिले संघटन त्याने निर्मिले.ते पहिले कामगार युनियन.
मूसाने इजिप्शियन राजाकडे ज्यूंना मुक्त करा असा अर्ज केला.परंतु राजाने प्रथम लक्ष दिले नाही.परंतु पुढे आपले मन बदलले.हे ज्यू दास रोगग्रस्त होते.हे मरतुकडे होते.
अत्यंत गलिच्छ वसतीत राहात.इजिप्त राष्ट्राला अशा लोकांपासून भय आहे,असे राजाला वाटले. इजिप्तमधील कितीतरी रोगांच्या साथी ज्यूंच्या या भिकार वसतीत प्रथम सुरू होत.मूसानेही ज्यूंना स्वच्छ सांगितले की इजिप्तमधील दहा प्लेगांची जबाबदारी तुमच्यावर आहे.तुमच्या डोक्यावर ते पाप आहे.शेवटी जेव्हा मूसाच्या नेतृत्वाखाली ज्यू इजिप्तमधून निघाले तेव्हा त्यांना परवानगी देताना इजिप्शियन राजाला वाईट न वाटता उलट आनंदच झाला.
ज्यूंचे हे महाप्रयाण त्यांच्या इतिहासात जरी अत्यंत महत्त्वाचे असले,तरी इजिप्शियनांच्या इतिहासात त्याला मुळीच महत्त्व नाही.जणू एक साधी क्षुद्र गोष्ट असे त्यांना वाटले.जुन्या करारात या महाप्रयाणाच्या यात्रेची भव्य,
भडक कथा रंगवलेली आहे.प्राचीन काळी प्रत्येक राष्ट्रांच्या इतिहासात सत्य व कल्पना यांचे मिश्रण केलेले असे.सत्यकथांत कल्पना मिसळलेली असे. ऐतिहासिक कादंबरी वा नाटक तयार केले जाई.
मूसाबरोबर जे ज्यू आले ते रांगडे होते.त्याच्यांत ऐक्य नव्हते.वृत्तीने ते भांडखोर होते.त्यांची नीट संघटना नव्हती.
परंतु मूसाच्या अलौकिक प्रतिभेने व बुद्धीने या लोकांची अभेद्य अशी एकजूट जन्माला आली.हे अभंग ऐक्य एकाएकी निर्माण झाले नाही.मूसाला त्यासाठी कितीतरी वर्षे प्रयत्न करावा लागला.या ज्यूंचे एक राष्ट्र बनविण्यापूर्वी मूसाने त्यांना नवीन स्मृती दिली; नवीन कायदे दिले.त्या ज्यू मध्ये एक नवीन प्राण त्याने फुंकिला.
मूसा जन्मजात पुढारी होता.या ज्यूंच्या साध्या मनावर परिणाम करण्यासाठी त्याने भव्यदिव्य विधी निर्माण केले.मानवी मनाला स्तंभित करणाऱ्या भव्य अशा नैसर्गिक स्थानी हे विधी करावयाचे,यासाठी त्याने तो सिनाई पर्वत पसंत केला.सिनाई पर्वताची ती काळीकभिन्न अशी,मेघांना फोडून वर जाणारी पाच शिखरे;पांढऱ्या वाळूचे धो ऽ करणारे लोंढे, सिनाई पर्वतावरील ते दगडधोंडे,ते कडे,ज्यांतून ईश्वराचे अट्टाहास्य जणू प्रतिध्वनित होई,ईश्वराचे आदेश जणू जेथून उद्घोषिले जात आहेत असे वाटे;अशी ही सिनाई पर्वताची जागा म्हणजे योग्य असे भव्य व्यासपीठ होते.या व्यासपीठावर बसून स्वर्ग व पृथ्वी एकत्र आणणे शक्य झाले असते..या सिनाई पर्वतावर बसून मूसाने आपला तो नवधर्म दिला.ते अर्धवट रानटी व अर्धवट उदात्त असे नीतिशास्त्र त्याने दिले.त्या नीतिशास्त्राने आजपर्यंत मानवांना मार्गही दाखविला आहे व पदच्युतही केले आहे. मूसाच्या या उपदेशात जरी प्रसंगविशेषी क्रौर्य दिसत असले,कोठे कोठे जरी बालिशता असली, तरी मानवी हृदयात मानवी विचार ओतण्याचा इतिहासकाळातील तो पहिला थोर प्रयत्न होता. त्याने तुझा डोळा फोडला तर तू त्याचा डोळा फोड,असे तो शिकवितो.परंतु त्या आरंभीच्या रानटी अवस्थेतून जो नुकताच बाहेर पडत आहे, त्याच्यापासून तुम्ही असे आदेश ऐकलेत तर त्यात आश्चर्य वाटण्यासारखे ते काय ? परंतु मूसाने गरिबांवर प्रेम करा व परकीयालाही सहानुभूती द्या,असेही सांगितले आहे.आजचा सुसंस्कृत समजला जाणारा विसाव्या शतकातील मनुष्य हा गरिबांना प्रेम देणे व परकीयांस सहानुभूती दाखविणे,एवढे तरी करतो का? मूसाचा उपदेश तीन हजार वर्षे झाली तरीही आपण अद्याप आपलासा केला नाही.मूसा जितका उंच चढला,तितके तीन हजार वर्षे झाली,तरी आपण चढलो नाही.मूसा आपल्यापुढे गेलेला आहे.आणि आपण अद्याप मागासलेले व रानटी आहोत.या मुसानेच मनुष्याचे बळी देऊ नये म्हणून शिकविले,हे आपण विसरता कामा नये.मूसाची ही उदार आज्ञा,त्याची ही प्रेमळ शिकवण अद्यापही आपण ऐकिली नाही. १९१४मध्ये लाखो आईबापांनी आपल्या मुलांचे युद्ध देवाला बळी दिले.
असे सांगतात,की ध्येयाला पोहोचण्यापूर्वीच मूसा मेला.
जो प्रदेश त्याला पुन्हा मिळावावयाचा होता,तिथे जाण्यापूर्वीच तो देवाघरी गेला.त्याने ज्या कामाचा आरंभ केला होता ते पुढे दुर्बळांच्या अंगावर पडले.त्यांना ते झेपेना,पार पाडता येईना.जगातील मोठ्यांतील मोठ्या क्रांतिकारकांच्या बाबतीत सदैव हीच गत झाली आहे.
मूसापासून तो लेनिनपर्यंत हाच दुर्दैवी अनुभव.परंतु मरण्यापूर्वी मूसाने स्वतःच्या दुबळ्या लोकांतील दुबळेपणा झडझडून पार फेकून दिला होता.वाळवंटातील स्वच्छ व जोरदार वारे आणून तो रोगटपणा त्याने नष्ट केला होता.त्याने जगायला नालायक असणाऱ्या जुनाट दुबळ्या दुर्बलांना खुशाल मरू दिले. त्यांच्याऐवजी नव्या दमाची,उत्साही अशी अग्रेसरांची पिढी त्याने उभी केली.
मृतप्राय लोकांतील निराश असा अवशिष्ट भाग त्याने वाळवंटात आणला आणि त्याच्याकडून संघटित असे नवराष्ट्र त्याने निर्मिले.हे राष्ट्र कधी मरणार नाही,मरायला कधीही तयार होणार नाही.
१७.०७.२४ या लेखातील शेवटचा दुसरा भाग..