शरद म्हणाला, "हो, हो! का नाही? तुम्ही पुढे व्हा. शेकोटी रस्त्यावर पेटवू.सगळ्या वावरात तयार पिकांच्या गंज्या पडल्या आहेत.
एखादी ठिणगी पडली तर आक्रीत घडायचं.तुम्ही रस्त्यावर जाऊन थांबा,मी शेकोटी पेटवायला गबाळ घेऊन येतो."
शेकोटी पेटली.तिच्याभोवती बसून पुन्हा गप्पा सुरू झाल्या.मघाशी कुणीच न खाल्लेला चिवडा शरदने आणला होता.स्वतःच्याही नकळत सगळ्यांनी तो खायला सुरुवात केली. शरद सांगू लागला -
आता प्रतापभाऊचं लक्ष्य गावात दारूबंदी करायचं आहे.गेल्या आठवड्यातच त्याने आधी गावातल्या बायांची आणि नंतर पुरुषांची बैठक घेतली.बायका तर दादल्यांच्या दारू पिण्याने फारच गांजल्या आहेत. पैशापरी पैसा जातो अन् घरात नवरा-बायकोची भांडणं-मारहाण नित्याचंच.त्यामुळे मुलांचा अभ्यास होत नाही.प्रतापभाऊने पुरुषांच्या सभेत सगळ्या पुरुषांना सक्त ताकीद दिली की,'प्रत्येकाने दारू सोडायचा प्रयत्न मनापासून करायचा.तुम्हाला मी एका महिन्याचा अवधी देतो.तेवढ्यात दारू सुटलीच पाहिजे.त्यानंतर कुणी दारू प्यायला तर त्याच्यावर सामाजिक बहिष्कार घातला जाईल.आणि हो,जर कुणी बायकोवर हात टाकला तर त्याला मोठा दंड होईल !'
प्रतापभाऊने अशी ताकीद दिल्यामुळे सगळ्या बायका प्रतापभाऊवर एकदम खूश !"
गप्पा चालू असतानाच लांबून एक दिवा हळूहळू जवळ येताना दिसला.शरद म्हणाला,"एवढ्या रात्रीचं कोण येतंय कोण जाणे!"
तेवढ्यात एक जण सायकलवर त्यांच्या जवळ येऊन थांबला.त्या सायकलस्वाराने विचारलं,"कुठलं गाव हे ?"
"मुखेड." शरदने उत्तर दिलं.
सायकलस्वार रागाने म्हणाला,"भररस्त्यात शेकोटी काय म्हून पेटवली ? उजेड बघून फसलो ना मी.आधीच चकवा लागल्यागत कवा धरून फिरून राह्यलोय.उजेड दिसला अन् मला वाटलं,आता आलो बराबर."
"कुठल्या गावी जायचंय ?" शरदने विचारलं.त्याने कुठल्याशा खेड्याचं नाव सांगितलं.शरदने त्याला रस्ता समजावून सांगितला.
तो गेल्यावर प्रकाश म्हणाला,"जग चंद्रावर पोहचलं आणि आपण अजूनही उजेड बघून गावाचा रस्ता शोधतोय!'
त्यावर यशा हसून म्हणाला,"पण खरंच आपण पोहचलो का चंद्रावर ? सोनार गुरुजी तर म्हणतात त्याप्रमाणे कुठले तरी दगड आणले अन् आपल्याला दाखवले."
त्यावर एकच हशा पिकला.
दुसऱ्या दिवशी सकाळी मंडळी सायकली घेऊन अशा बेताने निघाली की,पावणे आठ वाजता ते पारावर पोहचले.झाडून सगळा गाव पारावर जमा झाला होता. तालुक्याहून येणाऱ्या रस्त्याकडे उत्सुकतेने सगळे पाहत होते.त्यांचं आपसातल्या बोलण्याकडेही फारसं लक्ष नव्हतं.थोड्यावेळाने लांबून धुरळा उडत असलेला दिसला.सगळे ओरडले,
'आली,बस आली !'
थोड्याच वेळात बसचा ठिपका मोठा होत होत पारापाशी येऊन ठेपला.दोनचार लोक बसमधून उतरले. ड्रायव्हर-कंडक्टरने खाली उतरून बीडीकाडी ओढली. पंधरावीस मिनिटांनी तालुक्याला जाणाऱ्या लोकांना घेऊन बस परतीच्या प्रवासाला निघाली आणि पारावर जमलेले लोक आपापल्या कामाला जाण्यासाठी पारावरून उठले !
पोचवायला आलेला शरद म्हणाला,"गावात बस सुरू झाल्यापासून दररोजचाच हा खेळ झालाय.बस यायच्या वेळेला अख्खं गाव पारावर जमतं अन् बस ढळली की, शेतावर जायला पांगतं !"
घरी आल्यावर यशाने बापूंना गंमत म्हणून ही गोष्ट सांगितली.
त्यावर बापू म्हणाले,"यशा,कदाचित बाहेरचं जग आणि त्यांचं गाव ह्या मधला बस हा दुवा आहे, असं त्यांना वाटत असावं.
त्यांचं स्वतःचं गावापुरतं विश्व बाहेरच्या अफाट जगाशी ते बसच्या रूपाने स्वतःला जोडत असावेत !"
यशाने डोकं खाजवत बापू म्हणतात ती मानसिकता समजून घेण्याचा अयशस्वी प्रयत्न केला.
मुखेडहून आल्यापासून सगळ्यांना तिथे होत असलेल्या बदलाविषयी ऐकण्याचा छंदच लागला.मधूनमधून कुणीतरी विषय काढायचा आणि प्रतापभाऊ नवीन काय करतोय ते विचारायचा.तेव्हा शरद सांगायचा -
आता गावात दारूबंदी यशस्वी झाली होती.गावपण स्वच्छ झालं होतं.सार्वजनिक संडासांचं बांधकामदेखील सुरू झालं होतं.पंचायतीच्या काही सभासदांना वाटत होतं की,आपण 'आदर्श गाव योजने'त आपल्या गावाच्या नावाचा अर्ज भरावा.त्यांनी तसं प्रतापभाऊला विचारलं तर, 'आपण थोडं थाबावं',असं त्याचं मत पडलं.
"आपल्या गावातल्या सुधारणा नुकत्याच झाल्या आहेत. वर्षसहा महिने होऊन जाऊ द्या.पुढच्या वर्षी आपण नक्की अर्ज करू या.सध्या आपण गावात आणखी काय सुधारणा करता येतील ह्यावर लक्ष केंद्रित करू या." हे प्रतापभाऊचं म्हणणं गावकऱ्यांना पटलं.त्या दृष्टीने सगळ्यांनी प्रयत्न सुरू केले.
'गावात अजूनपर्यंत वीज आली नव्हती.ती आणण्याचा प्रयत्न करू या' असं प्रतापभाऊने सुचवलं.सरपंचाच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ जिल्ह्याच्या ठिकाणी गेलं. प्रतापभाऊ अर्थातच सोबत होता.बोलण्याचं काम तोच करत होता.
मोठ्या साहेबांनी म्हटलं,"गावापासून सगळ्यात जवळचा खांब दोन कोसांवर आहे.तिथून गावापर्यंत वीज आणायची तर खर्चाचं काम आहे.यंदाच्या बजेटमध्ये तेवढी तरतूद केलेली नाहीय.पुढच्या वर्षी नक्की बघू या."
काहीतरी आशेचा किरण दिसला म्हणून शिष्टमंडळ खूश होऊन गावाकडे परतलं.गावात सगळे सण घरोघरी किंवा आपापल्या गल्लीत साजरे होत असत. प्रतापभाऊने सगळ्या तरुणांची एक बैठक घेतली. गणपती,होळीसारखे सण सगळ्यांनी मिळून साजरे करण्याची कल्पना मांडली.त्यामुळे सण मोठ्या प्रमाणात साजरा होऊ शकणार होता.शिवाय वेगवेगळ्या ठिकाणी सण आतापर्यंत साजरे केले जात असताना ईर्षा आणि ईर्षेतून होणारी भांडणं हेदेखील टळणार होतं.लोकांमध्ये एकजूट राहू शकणार होती.
सगळ्यांनी प्रतापभाऊची ही कल्पना उचलून धरली.चर्चेच्या ओघात एकाने विचारलं,
"भाऊ,नागपंचमी दहा दिवसांवर आलीय.घरोघरी पोरंसोरं लहान मोठे झोके बांधतीलच पण गावात एक मोठा झोका बांधू या.काही शर्यतीपण लावू या."
"मग जिंकणाऱ्याला बक्षीसपण देऊ या!" दुसऱ्याने पुस्ती जोडली.
एकामागून एक सूचना येऊ लागल्या.अनेकांनी मांडलेल्या सूचनांवर आणि कल्पनांवर सगळ्यांनी मिळून चर्चा केली.प्रत्येक जण हिरिरीने आपला सहभाग देऊ करत होता.अशा रीतीने नागपंचमीला गावाबाहेरच्या पुरातन वटवृक्षाला एक मोठा झोका बांधायचं ठरलं.गावाच्या अंगात उत्साह संचारला.सण असला तरी तो शिस्तीत साजरा व्हावा म्हणून प्रतापभाऊने म्हटलं,
"आपण एक नागपंचमी कमिटी स्थापन करू या.त्यात गावातल्या महिलांनाही सामील करून घेऊ."
"तुमचं अगदी बरोबर आहे भाऊ.अहो,बायकांचाच सण हा.परगावाहून किती तरी माहेरवाशीणीही येतात." एक जण म्हणाला.
नागपंचमी कमिटी स्थापन झाली.तिच्या तीन बैठका झाल्या.
प्रतापभाऊ तरुणांना आणि महिलांना पुढाकार घ्यायला,निर्णय घ्यायला प्रोत्साहन देत होता.
कमिटीने वडाखालच्या जागेची साफसफाई केली. झाडंड्झुडपं,
काटेकुटे,दगडगोटे गोळा करून जागा मोकळी केली.गावकऱ्यांना-मुख्यतः बायाबापड्यांसाठी बाजूला एक साधासा मंडप बांधला.
तालुक्याच्या गावातून हलकडी मागवली.तिच्या वीरश्रीयुक्त आवाजाने झोका चढवणाऱ्याला हुरूप येणार होता. झोका बांधण्यासाठी मोटेचे वीस फूट दोन मोठे सौंदर आणले.गावच्या सुभान्या सुताराने उभं राह्यला लाकडाची जंगम फळी बनवून दिली.पायाला टोचू नये म्हणून त्याने फळी चांगली गुळगुळीत बनवली होती. शिवाय जाडजूड दोरखंड बांधायला दोन्ही बाजूंनी लोखंडी कड्यासुद्धा बसवल्या होत्या.आदल्या दिवशी संध्याकाळीच झोपाळा बांधून तयार झाला होता. झोपाळा खरंच मोठा शोभिवंत दिसत होता.ज्या फांदीवर तो बांधला होता तिला समांतर वीस फुटांवर एक दोरखंड बांधून छोट्याशा दोरीने त्याला मधोमध एक फडकं लटकवून दिलं होतं.सगळी तयारी झाल्यावर कमिटीतल्या एका दांडग्या पोराने झोका चढवून पाहिला.त्याचा झोका त्या लाल फडक्याच्या पाच फूट खालपर्यंतच पोहचला.पण तिथपर्यंत झोका पोहचवायला त्याला चाळीस मिनिटं लागली.नंतर झोका थांबवायला वीस मिनिटं.कारण मोटेच्या जाडजूड दोरखंडाने झोपाळ्याचं वजन खूप झालं होतं. झोक्यावरून खाली उतरल्यावर तो जवान घामाघूम झाला होता.रात्री आजूबाजूच्या भागात आणि झोपाळ्याच्या दोरखंडाला पताका लावण्यात आल्या होत्या.एकंदर गावात धामधूम सुरू झाली.
नागपंचमीचा दिवस उजाडला.घरोघरी माहेरवाशिणी आल्या होत्या.कमिटीने सकाळीच गावात दवंडी पिटवून गावकऱ्यांना गावाबाहेरच्या झोक्याकडे यायचं,शर्यतीत भाग घेण्याचं आवतन दिलं होतं.मुख्य गोष्ट म्हणजे जिंकणाऱ्याला एक सोन्याची अंगठी मिळणार होती. गावातली सगळी तरणी पोरं आपणच शर्यत जिंकून अंगठी मिळवणार अशी शेखी मारत होती.
झोक्याजवळ शहरातून आणलेली हलकडी वाजायला लागली तसं निम्मं गाव आधीच जमलं होतं.उरलेलं निम्मं हलकडीचा आवाज ऐकून लगबगीने गावाबाहेर जाण्यासाठी धावलं.एकेक जण झोका चढवायचा प्रयत्न करत होता.काही जणांनी पहिल्या पाचदहा मिनिटांतच 'हे आपल्या आटोक्यातलं काम नाही, म्हणून माघार घेतली.नवीन भिडू झोक्याजवळ गेला की,सगळेजण टाळ्याला प्रोत्साहन देत आणि त्याचा प्रयत्न फसल्यावर त्याची हुर्योवाडीपण करीत.दोनचार धाडसी बायांनीसुद्धा प्रयत्न केले.पण थोड्याच वेळात धापा टाकत त्या परत घोळक्यात सामील झाल्या.जेवायची वेळ झाली.लोक एकेक करून घरी जाऊन जेवून परत येत होते.
संध्याकाळचे पाच वाजायला आले होते.फक्त दोघांचाच झोका आडव्या दोरखंडाला बांधलेल्या लाल फडक्यापर्यंत कसाबसा पोहचला पण नंतर त्यांचा दम तुटला अन् त्यांनी प्रयत्न सोडून दिले.गावातले काही लोक बाजूला उभ्या राहिलेल्या नागपंचमी कमिटीच्या सभासदांकडे जाऊन आडवा दोरखंड आणि लाल फडकं थोडं खाली घ्यायला सांगू लागले.कमिटी मेंबर्सही त्याला तयार झाले.तरी 'त्या आधी कुणी एखादा रुस्तुम राहिला आहे काय प्रयत्न करायचा?',असं कमिटी मेंबर्सपैकी एकाने विचारलं आणि कुणाला तरी म्हमद्या खाटकाची आठवण झाली! म्हमद्या खाटकाचं दुकान गावात होतं.कुणाची बकरी,कुणाची कोंबडी कापून-साफ करून देण्याचं काम म्हमद्या करायचा. आजूबाजूच्या गावात कुठे कुस्तीचा फड लागला की, तिथे म्हमद्या कुस्ती खेळायला हजर ! कुणीतरी म्हणालं,
"अरे जा रे, म्हमद्याला असेल तसा घेऊन या.नेहमी गावात बेटकुळ्या फुगवून दाखवत असतो."
दोनचार जण म्हमद्याला आणायला गावाकडे झिंगाट पळाले म्हमद्या नुक्ताच जेवूनखाऊन लवंडला होता. त्याला बोलवायला धावतपळत आलेल्या पोरांनी त्याला धड कपडेसुद्धा घालायची उसंत दिली नाही.तसाच पुढे घालून झोक्याच्या जागी आणला.
म्हमद्याने लुंगी अन् वरती मलमलचा कुडता घातला होता.गळ्यात अन् दंडाला काळा गंडा बांधलेल्या म्हमद्याने आखाड्यात शिरताना माती मस्तकाला लावतात तसा झोक्याला नमस्कार केला.मग तो झोक्यावर उभा राहिला.
म्हमद्याने हळूहळू झोका चढवायला सुरुवात केली. झोका चढवण्याची त्याची पद्धत इतरांपेक्षा वेगळी होती. झोका मागे गेला की,तो खाली बसायचा.झोका पुढे जाण्याच्या वेळेस शरीराचं वजन मागच्या बाजूला जाईल अशा रीतीने पाठीची कमान करून तो उभं राह्यचा.असं केल्यामुळे झोक्याला एक प्रकारचा गचका मिळून झोका वरती जायचा.हळूहळू झोका चांगलाच वरती गेला.लो कांच्या अपेक्षा आणि टाळ्या वाढत गेल्या. 'आईच्यानं म्हमद्याने तर कमालच केली...', 'अंगठी त्योच गबरू न्हेनार...' अशा आरोळ्या जमावातून येऊ लागल्या.
झोक्यावर चढल्यापासून म्हमद्या तीसपस्तीस मिनिटं सतत झोका घेत होता.अजूनही त्याचा दम तुटलेला दिसत नव्हता.म्हमद्या लाल फडक्यापासून फूटभर अंतरावर राह्यला अन् आक्रीतच घडलं !
हवेच्या झोताबरोबर म्हमद्याची लूंगी जी सतत खाली बसून उठून ढिल्ली झाली होती ती आता सुटली अन् उडाली की ! मांजा तुटून पतंग कटावा तशी ती हवेत भरकटत राहिली.त्याला बोलवायला गेलेल्या पोरांनी त्याला नीट कपडेही घालू दिले नव्हते.होता तसा त्याला बाहेर काढून इथवर आणला होता.त्यामुळे त्याने आत काहीच घातलं नव्हतं.म्हमद्या चांगलाच गोंधळला. त्याला काय करावं काही सुचेना.झोका वीस फूट पुढे अन् वीस फूट मागे लंबकासारखा फिरायला लागला. क्षणभर सगळा जमाव सुन्न ! पुढच्याच क्षणी जमावाची जी तारांबळ उडाली म्हणता ! बायाबापड्या तर भुर्रकन घराकडे पळाल्या.पोरासोरांनापण जाणत्या लोकांनी पिटाळून लावलं.नंतर उरलेल्यांनी म्हमद्याला वेगवेगळ्या सूचना करायला सुरुवात केली.
कुणी म्हणे, 'खाली बस.' कुणी म्हणे 'उभा राहा.' तर कुणी सांगे 'अंगातला कुडता काढून कंबरेला बांध.' कमिटी हतबुद्ध उभी राहिली.हलकडीवाले ह्या क्षणाला वाजवावं की नाही ह्या संभ्रमात! प्रतापभाऊने तर कपाळावर हात मारून घेतला ! झोका दहा फुटावर आला.म्हमद्याने झोक्यावरून उडी मारली अन् खाली पडलेली लुंगी धावत जाऊन उचलून ती कशीबशी कंबरेला गुंडाळत तो घराकडे झिंगाट पळाला !
प्रतापभाऊने आणि कमिटीने म्हमद्याला विजयी घोषित केलं.
कारण तो आडव्या दोरखंडापर्यंत जवळजवळ पोहचलाच होता.पण म्हमद्या अंगठी घ्यायला होता कुठे ? तो तर लांबच्या नातलगाकडे जो निघून गेला तो थेट महिनाभर त्याने कुणाला तोंडच दाखवलं नाही ! त्यामुळे एक मोठं आक्रीत आणखी घडलं-गावात खाटकाचं एकच दुकान असल्यामुळे सगळ्या गावाची महिनाभर मोठीच पंचाईत झाली की राव !