रविवारच्या दुपारपासून वाड्यावर पत्त्यांचा अड्डा बसत असे.
बापूदेखील रविवारची ह्यासाठीच वाट बघत असत. रविवारी त्यामुळेच बापूंच्या वामकुक्षीला सुट्टी असे.
( गावगोत,माधव सावरगांवकर,अष्टगंध प्रकाशन )
बापूंच्या वामकुक्षीला सुट्टी असल्यामुळे यशा,मंदा आणि मुक्ता खूश असत.कारण बापूंना झोप लागेपर्यंत - जी कधी लवकर लागत नसे,त्यांची पावलं थोपटत अन् पोटऱ्या दाबत बसावं लागे.
थोडं थांबलं तर बापू पावलं हलवत आणि हूं ऽऽऽ असा हुंकार देत.थोड्याच वेळात मुलांचे हात दुखू लागत आणि त्या हात दुखण्यापेक्षा त्यांना कंटाळाच जास्त येई.मग त्यांनी एक युक्ती शोधून काढली.दोघांनी एकमेकांना खुणवायचं आणि एकदम ओसरीमधून झिंगाट पळायचं.इतकं जोरात की,बापूंनी हुंकार देईपर्यंत त्यांच्या आवाजाच्या टप्प्याच्या बाहेर जायचं.मुलं कंटाळतात हे बापूंनादेखील माहीत असायचं.तेही नंतर त्यांना रागवत नसत. रविवारी मात्र पत्त्यांमुळे वामकुक्षी नाही अन् त्यामुळेच पाय दाबणंही नाही.सुट्टी ! सुट्टी म्हणजे एकदम सुट्टी !
जेवण झाल्यावर पहिला अड्डा ब्रीजचा असे.चव्हाण काका,नाईक काका अन् ठोंबरे काका हे ब्रीजचे नियमित मेंबर असत.ते सगळेच समवयस्क असल्याने त्यांच्या गप्पा ऐकण्यात यशाला मौज वाटे.
सतत तिथे बसल्याने त्यालाही ब्रीजचा खेळ समजायला लागला होता.त्यामुळे आवडायलाही लागला होता.दुपारी साधारण एक वाजता सुरू झालेला खेळ साडेपाच वाजेपर्यंत चालायचा.खरं तर,खेळणं पाच वाजेपर्यंतच असे.पाच वाजता माई चहा तयार करून मंदाबरोबर किंवा यशाबरोबर ओसरीवर पाठवत.चहा पिता पिता कॉल देताना किंवा पत्ते टाकताना कोण चुकलं ह्याची चर्चा होई.कधी कधी ती चर्चा वादात बदले.पण हे सगळं साडेपाचला नक्की संपे.कारण साडेपाचला गल्लीतले दुसरे मेंबर - सोनारमास्तर,धनुमामाजी, दाणीकाका हे सातहाती खेळायला येत.बापू अर्थातच दोन्ही खेळांतले कॉमन मेंबर होते.धनुमामाजी वाड्याच्या मागच्या भागातल्या मारवाडी कुटुंबाचे प्रमुख होते.
त्यांच्या किराणामालाच्या दुकानाला रविवारी सुट्टी असे.दाणीकाका बँकेतून रिटायर्ड झाले होते.
सोनारमास्तर गल्लीतच असलेल्या प्राथमिक मुलांची शाळा नंबर दोनचे हेडमास्तर होते.यशासकट गल्लीतील सगळीच मूलं कधी ना कधी सोनारमास्तरांच्या हाताखाली शिकली होती.रविवारी मुलांना खेळताना हाक मारायला कुणी नसे.अंधार पडेपर्यंत डबा ऐसपैस, चोरशिपाई किंवा लगोरी असे खेळ चालत.त्यानंतर मारुतीच्या पारावर गप्पांचा अड्डा बसे आणि वेगवेगळ्या विषयावर त्यांच्या गप्पा चालत.
त्या रविवारीही अशाच गप्पा रंगल्या होत्या.नुकतंच चंद्रावर अमेरिकेचं यान उतरलं होतं.माणसाने चंद्रावर पहिलं पाऊल ठेवलं होतं.तिथून परतताना त्यांनी चंद्रावरून दगडपण आणले होते.
बाकीच्यांनी ह्याबद्दलच्या बातम्या पेपरमध्ये वाचल्या होत्या.पण ग्रुपमध्ये दत्ताच्या देवळातला श्रीपाद हा एकटाच असा भाग्यवान होता ज्याने ते दृश्य टीव्हीवर पाहिलं होतं. अजून गावात टीव्ही आलेला नव्हता. पण श्रीपाद त्यावेळी नेमका त्याच्या ताईकडे मुंबईला गेला होता म्हणून तो ही ऐतिहासिक घटना पाहू शकला होता. साहजिकच त्यामुळे तो अधिकारवाणीने ह्या विषयावर बोलत होता आणि बाकी सगळे त्या भाग्यवंताचा शब्द न् शब्द आश्चर्याने अन् कौतुकाने टिपत होते.
गप्पा ऐनभरात होत्या त्यामुळे आतला सातहातीचा डाव कधी संपला आणि कधी सोनारमास्तर येऊन गप्पा ऐकत उभे राहिले हे कुणालाच कळलं नाही.
"अरे,हे अमेरिकावाले काहीही बावळ्या मारतात अन् तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवता ?" सोनार मास्तरांच्या आवाजाने सगळे चिडीचूप झाले.
श्रीपाद काहीसा चिडून म्हणाला, "पण गुरुजी,तिथून आणलेले दगडपण टीव्हीवर दाखवले..."
"तू ह्या आधी चंद्रावरचे दगड पाहिले होते का रे कधी ? त्यांनी सांगितलं अन् तुम्ही विश्वास ठेवला !"
आता प्रत्यक्ष शाळेच्या हेडमास्तरांनीच अमेरिकेवर अविश्वास दाखवला तिथे इतरांची काय कथा ! श्रीपाद मात्र हिरमुसला.
गप्पांचा अड्डा चालूच राहिला.घरच्यांनी हाका मारल्यावर एक एक जण घरी जाऊन पटकन् जेवून आला.
आता विषय तालुक्याच्या गावाचं जीवन आणि अगदी छोट्या खेड्याचं जीवन ह्याकडे वळला.प्रकाश हा मारवाड्यांच्याच कुटुंबातला धनुमामाजींच्या लहान भावाचा - मिश्रीलालजींचा मुलगा.मिश्रीलालजी आठ कोसांवर असलेल्या मुखेड नावाच्या खेड्यात राहत. तिथे त्यांचंही किराणामालाचंच दुकान होतं.प्रकाश अतिशय बुद्धिमान अन् गोष्टीवेल्हाळ मुलगा होता.तो मधूनमधून मुखेडला जात असे.त्याला तिथल्या सुरस आणि चमत्कारिक कथा ऐकायला मिळत.त्या इतरांना सांगण्यात त्यालाही मौज वाटे आणि ऐकणाऱ्यांनाही. त्याच्या गावात अजून लाईट आले नव्हते.
वर्तमानपत्रही यायचं नाही.फोनचा तर तालुक्याच्या गावीच पत्ता नव्हता तिथे छोट्या गावात कसा असणार ? एकंदरीत जगाशी काहीही संबंध नसलेलं ते एक एकाकी बेट झालं होतं.
एकदा सगळी मित्रमंडळी प्रकाशच्या गावाला सायकलवरून निघाली.भल्या सकाळीच सायकली काढल्या कारण घरच्या मंडळींनी उन्हाच्या आत मुखेडला पोहचा असं बजावून सांगितलं होतं.तरीही पोहचेस्तोवर अकरा वाजले.सगळ्यांचे चेहरे श्रमाने आणि उन्हाने लाल झाले होते.हातपाय धुऊन सगळे फ्रेश झाले.चहा पिऊन लगेच नदीकाठचं रामाचं मंदिर पाहायला निघाले.दुपार झाली होती तरीसुद्धा वातावरण उबदार अन् सुखकारक होतं.
राममंदिर खूप प्राचीन होतं.आजूबाजूच्या परिसरात प्रसिद्ध होतं.नदीच्या काठावर खडकावर असलेल्या पावलांसारख्या खुणा प्रकाशने दाखवल्या.गावकऱ्यांच्या श्रद्धेप्रमाणे त्या खुणा हनुमानाच्या पावलांच्या आहेत म्हणून मंदिरात दर्शनाला आलेले लोक त्यांचीही पूजा करतात,असं प्रकाशने सांगितले.सगळ्या मित्रांनीही भक्तिभावाने त्या पाऊलखुणांना नमस्कार केला.
घरी येईपर्यंत पोटात कावळे ओरडायला लागले होते. प्रकाशच्या आईने जेवायला डाळबट्टी अन् मुगाचा हलवा असा बेत केला होता.सगळे जण त्यावर तुटून पडले.आकंठ जेवण झाल्यावर मागच्या घरात गाद्या पसरून ठेवल्या होत्या तिथे बडीशोप चघळत सगळे गप्पा मारत बसले.थोड्या वेळात काहींना पोटात तडस लागली.प्रकाशची आई म्हणाली, "काही काळजी करू नका. डाळबट्टीच्या जेवणामुळे होतं असं.तुम्ही जसजसं पाणी प्याल तसतशा डाळबट्ट्या पोटात फुगतात.प्रकाश, दुकानातून सोडा अन् थोडा ओवापण आण.थोड्या वेळात बरं वाटेल तुम्हाला."
दुकान घराच्या पुढच्याच भागात होतं.प्रकाशने लगेच सोडा आणि ओवा आणला.गप्पा मारता मारता एक एक जण आडवा झाला अन् घोरायलाही लागला.पाचच्या सुमारास सगळे हळूहळू जागे झाले.चहापाणी झाल्यावर गावाच्या बाहेर असलेल्या प्रकाशच्या मित्राच्या शेतावर जायची टूम निघाली.मित्रमंडळी तर काय तयारच होती. रूटीनमध्ये बदल,मनापासून प्रकाशच्या आईवडिलांनी केलेलं स्वागत अन् मिष्टान्नाचं जेवण ह्यामुळे सगळ्या मित्रांच्या उत्साहाला उधाण आलं होतं.सगळेजण तयार होऊन चालतच निघाले.त्यामुळे पहिला चालणारा अन् शेवटचा चालणारा यात बरच अंतर पडत होतं.त्यामुळे ओरडून बोलावं लागत होतं पण त्यातही गंमत होती.
शहरात थोडं जरी मोठ्या आवाजात बोललं तर मोठी माणसं ओरडत,एखादी म्हातारी आजीबाई तिरकसपणे म्हणे,'घशात मुसळ घातले का रे पोरा तुझ्या?'
इथे अशी काही बंधनं नव्हती.सगळी मुलं आजूबाजूला विपुल दिसणाऱ्या रानपाखरांसारखी स्वच्छंद वागत होती.मळ्यावर प्रकाशच्या मित्राने चहा-चिवड्याचा बेत केला होता.चिवड्याला सगळ्यांनी नकार दिला कारण सकाळचं खाल्लेलं अजून पोटातलं जराही हललं नव्हतं. पण चहा मात्र सगळे प्यायले.घराच्या बाहेर खळ्यातच जाड जाजम टाकून गप्पांचा अड्डा जमला.छोट्या गावात काय घडणार असं सगळ्यांना वाटत होतं पण प्रकाशच्या मित्राने - शरदने दिलेली माहिती ऐकून सगळ्यांना आश्चर्याचा धक्काच दिला.शरद सांगत होता.
मिलिटरीमधून रिटायर होऊन प्रताप भोसले नावाचा गावातला तरुण परत आला होता.प्रताप अतिशय धडाडीचा होता.त्याचे गावासंबंधी काही आदर्श विचार होते.गावानेदेखील त्याने न मागता त्याला सामाजिक नेतृत्व दिलं होतं.कारण प्रतापला राजकारणात अजिबात इंटरेस्ट नव्हता.चारसहा महिन्यांपूर्वीच तो गावात कायमचा म्हणून आला होता.अगदी प्रथम त्याने गावातल्या स्वच्छतेकडे लक्ष दिलं.प्रतापच्या भोवती गावातली सगळीच्या सगळी मुलं जमा झाली होती. वयस्कर मंडळी औत्सुक्याने आणि आशेने त्याच्याकडे पाहत होती.प्रतापने गावातल्या प्रत्येक गल्लीत एक मंडळ स्थापन केलं.ग्रामपंचायतीने नेमलेल्या कर्मचाऱ्यांकडून गल्ली साफ करून घेण्याची जबाबदारी त्यापैकी एकेकावर आळीपाळीने सोपवली.
ग्रामपंचायतीने नेमलेल्या सफाई कर्मचाऱ्यांकडून गल्ली साफ करवून घेण्याची जबाबदारी तरुणांच्या मंडळाची होती.प्रतापने प्रत्येकाकडून सुरवातीलाच शपथ घेऊन ठेवली होती की,ते कुणाशीही भांडणतंटा करणार नाहीत.जर कुणी सफाई कर्मचारी कामात टंगळमंगळ करत असेल तर त्याला फक्त समज द्यायची.
तरीही त्याने कामाकडे दुर्लक्ष केलं तर ते काम मंडळाच्या स्वयंसेवकांनी करायचं आणि त्या कर्मचाऱ्याची माहिती प्रतापला द्यायची.प्रकाशच्या ह्या योजनेमुळे गावाचं रूपडंच पालटून गेलं होतं.संपूर्ण गाव चकचकीत झालं होतं.गावातल्या सगळ्यांचंच आरोग्य त्यामुळे सुधारेल हे प्रतापने सगळ्या गावाला पटवून दिलं.सगळा गाव जणू प्रतापचा भक्तच झाला.आता प्रताप सगळ्या गावाचा प्रतापभाऊ झाला होता.
साफसफाईनंतर प्रतापभाऊने गावाच्या सार्वजनिक संडासाकडे लक्ष द्यायला सुरुवात केली.गावात सार्वजनिक संडास नव्हतेच.
एखाद दुसरा धनिक, व्यापारी सोडला तर सगळा गाव सकाळी उठून प्रातर्विधीसाठी माळरानावर जात होता.ग्रामपंचायतीने स्त्री-पुरुषांसाठी वेगवेगळ्या जागा नेमून दिल्या होत्या. तरी तिथे जाणं स्त्रियांना लज्जास्पद आणि वृद्धांना त्रासदायक वाटायचं.शिवाय अनकाईच्या जंगलातून आलेल्या एखाद्या चुकार बिबट्याने प्रातर्विधीसाठी आलेल्या कुणाला उचलून नेल्याच्या काही घटना घडल्या होत्या.प्रतापभाऊने ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात घेतलं आणि त्यांच्यामार्फत सरकारी योजनेत अर्ज केला.
सुरुवातीला गावातल्या म्होरक्यांना हा सामाजिक कार्य करतो आहे पण ह्याचा खरा उद्देश स्वतःचं राजकीय वर्चस्व निर्माण करायचा आहे असा संशय होता.पण त्याने हे काम ग्रामपंचायतीतर्फे करून घेतल्याने त्या संशयाचं निराकरण झालं.त्यामुळे तेही खुल्या दिल्याने प्रतापभाऊच्या पाठीशी उभे राहिले.
'मागच्याच आठवड्यात सहा सार्वजनिक संडास बांधण्या
संबंधीच्या मंजुरीचं पत्र ग्रामपंचायतीकडे आलं आहे,असं शरदने सांगताच सगळ्यांनी उत्स्फूर्तपणे टाळ्या वाजवल्या.
"शरद,आणखी सांग ना प्रतापदादाच्या विधायक कामाच्या कथा." यशा शरदला म्हणाला.
शरद पुढे सांगू लागला -
गावात बैलगाड्यांशिवाय दुसरं वाहतुकीचं साधन नव्हतं. वैयक्तिकरीत्या कुणी सायकलवर तर अगदी दोनचार जण मोटरसायकलचा वापर कुठे जाताना करताना दिसत.पावसाळ्यात चिखल व्हायचा त्यामुळे तर त्यावेळी सगळ्या गावाला फारच त्रास व्हायचा.पण प्रतापने गावातून सह्या जमवल्या आणि सरपंचाच्या पत्राला त्या सह्या जोडून तो अर्ज एसटीच्या अधिकाऱ्यांकडे तो स्वतः घेऊन गेला.त्याने त्याचा पाठपुरावाही केला.त्याच्या प्रयत्नांना यश येऊन सध्या तालुक्याच्या गावापासून बसची एक फेरी सुरू झाली आहे. 'काही दिवसांनी आणखी फेऱ्या वाढवून घेऊ' असं प्रतापभाऊ म्हणत होते आणि ते म्हणतात म्हणजे तसं नक्की होणार! उद्या सकाळी आठ वाजता गावाबाहेरच्या पाराजवळ जा म्हणजे तुम्हाला एक गंमत दिसेल.आता अंधार पडायला लागला होता आणि थंडीपण हळूहळू वाढत होती.प्रकाश शरदला म्हणाला, "पुढच्या गप्पा मारायला शेकोटी पेटवू या का?"
शिल्लक भाग पुढील लेखामध्ये