१९३९ साली घडलेल्या घटनेवरचं लॉस्ट ऑन अ माउंटन इन मेन हे पुस्तक हार्पर कॉलिन्स प्रकाशनाने १९७८ साली पहिल्यांदा प्रकाशित केलं.त्यांच्या या साहसाबद्दल बोलण्यासाठी डॉन फेंडलर यांना जगभरातून अनेक ठिकाणांहून आमंत्रणं आली.अगदी शेवटपर्यंत ते आपला अनुभव मुलांसोबत शेअर करत फिरले.
२०१६ साली ८९ व्या वर्षी त्यांचं निधन झालं.
१५.०६.२५ या लेखातील दुसरा शेवटचा भाग…
पाय खुरडत त्याला चालावं लागतं.दगडांवरून चालून आणि काटेरी फांद्या धरून हाता-पायांचे तळवे सोलवटलेले असतात.
एवढंच नव्हे,तर झोपेत खाजवून खाजवून संपूर्ण अंगभर जखमा झालेल्या असतात.त्या ताज्या जखमांवरच आता माश्या आणि नाना प्रकारचे किडे बसलेले असतात.ही अवस्था मोठ्या माणसालाही रडकुंडीला आणायला पुरेशी असते,मग डॉनची काय कथा! पण आपलं रक्ताळलेलं शरीर पाहत असतानाच त्याला झाडावर बसून चिवचिवाट करणारा एक पक्षी दिसतो.डॉन लिहितो,'तो पक्षी इतका आनंदात गात होता आणि मजेने किडे खात होता की मला वाटलं, ही जागासुद्धा अगदीच काही वाईट नसावी.' या विचारासरशी डॉन पुन्हा उल्हसित होतो.आपण मोठ्या संकटात सापडलोय असं त्याला अजूनही वाटत नसतं.
आता थोड्याच वेळात कुठल्या तरी वळणावर आपल्याला समोर कॅम्प दिसणार,असं गृहीत धरून तो पुन्हा चालू लागतो.ओढ्याच्या काठाने कधी दलदल असते,कधी मोठाले दगड असतात,तर कधी काट्यांनी भरलेली झाडं.आपण नेमके कुठल्या दिशेने चाललोय याचीही डॉनला कल्पना नसते.चालत राहायला पाहिजे, एवढंच त्याला कळत असतं.तिसरा दिवसही असाच संपतो.थोडीफार फळं खाऊन आणि पाणी पिऊन डॉन रात्रीला सामोरा जातो.या वेळी त्याला ओढ्याकाठीच मऊ गवताने आच्छादलेली जागा सापडते.त्या विचित्र परिस्थितीतही डॉनच्या मनात येतं,'काय छान जागा मिळालीय झोपायला! नशीबवान आहे मी! आल्या परिस्थितीशी डॉन किती सहज जुळवून घेतो हे त्याच्या अशा अनेक उद्गारांवरून कळतं.त्या रात्री त्याच्या दृष्टीने आणखी एक सुंदर गोष्ट घडते.डॉन ओढ्याकाठी पडून असताना एक हरिण तिथे पाणी प्यायला येतं.डॉनला बघून ते त्याच्या जवळ येतं.इतकं जवळ,की अंगावर झेप घेतं की काय असं वाटावं.पण त्याचा वास घेऊन ते पुन्हा ओढ्याकडे वळतं.शांतपणे पाणी पितं आणि निघून जातं.डॉन लिहितो, 'त्या वेळी मी इतका भुकेला होतो,की पाणी पिणाऱ्या हरणाला दगडाने ठेचून मारणं शक्य होतं;पण तो विचार तेव्हा माझ्या डोक्यातही आला नाही.उलट,ते मला घाबरलं नाही,या जाणिवेने मी खूष झालो आणि आनंदाने झोपी गेलो.'
चौथा दिवस उजाडतो.आता भुकेचा राक्षस डॉनला चांगलाच छळू लागलेला असतो.डोळ्यांसमोर सतत दुधाचा कप दिसत असतो.
त्यामुळे साहजिकच घरची, आईची आठवण येत असते.आपण कुठून या संकटात सापडलो,असं वाटून मनावर मळभ येत असतं.
पण ते बाजूला सारून मिळतील तेवढ्या स्ट्रॉबेरी खाऊन तो चालत असतो.एकदा अचानक त्याच्या समोर एक दांडगं अस्वल उभं राहतं ! डॉनला पाहून ते असं काही किंचाळतं की डॉनचा श्वासच थांबतो.तिथून पळून जाण्याचंही त्याला सुचत नाही.काहीही हालचाल न करता तो नुसता उभा राहतो.अस्वलही त्याच्याकडेच बघत असतं.अख्खं एक मिनिट असंच जात.
पण नंतर ते अस्वल तिथून धूम ठोकतं आणि ओढा पार करूनच थांबतं.अस्वलाची ती पळापळ बघून डॉनला हसू आवरत नाही.हसता हसता तो जमिनीवर लोळण घेतो. त्या परिस्थितीतही डॉनचं हसणं हरवलेलं नसतं.
आता जंगलात हरवून चार दिवस होत आलेले असतात. डॉनला अशक्तपणा जाणवू लागलेला असतो.सगळ्यांत मोठा त्रास असतो तो त्याच्या जखमी पायांचा आणि अंगभर चावणाऱ्या डास-माश्यांचा.पायांत बूट नसताना चालणं म्हणजे दर दोन पावलांनंतर वेदनेने ओरडावं लागणं.अनेकदा वेदना इतक्या असह्य होतात की तो विश्रांतीसाठी थांबून बराच वेळ रडत राहतो.अचानक कुठून तरी आई-वडील यावेत आणि आत्ता याक्षणी ताबडतोब आपली यातून सुटका व्हावी असं दरक्षणी त्याच्या मनात येत असतं;पण दुसरीकडे असं होणार नाहीये याचीही त्याला जाणीव असते.ही आपण केलेली चूक आहे,ती आपल्यालाच निस्तरावी लागेल,असं तो स्वतःला बजावत असतो.
पण शरीर थकलं असलं तरी त्याचं मन मात्र हिंमत हरायला तयार नसतं.शरीर आणि मन या दोन वेगळ्या गोष्टी आहेत याची जाणीव डॉनला नकळत होत जाते.कितीही थकला,कितीही निराश झाला तरीही हिंमत हरून एकाच जागी पडून राहण्याचा विचार त्याच्या मनाला शिवत नाही.तो चालत राहतो.आणि तरीही चालतंय ते वेगळ्याच कुणाचं तरी शरीर आहे असं त्याला सारखं वाटत असतं.
पाचव्या दिवशी एके ठिकाणी त्याला रस्ता म्हणावा अशी वाट दिसते.तिथे काही कापलेली लाकडं टाकून ठेवलेली असतात.या पाच दिवसांत दिसलेल्या मानवी, अस्तित्वाच्या त्या पहिल्याच खाणाखुणा असतात.तो रस्ता पाहून डॉन इतका खूष होतो की थोडा वेळ पायांमधल्या वेदना विसरून पळत सुटतो.आपली शक्ती संपली असं वाटत असतानाही अचानक आपल्या शरीरात एवढा जोर कुठून आला हेच त्याला कळत नाही.तो हुशारतो.हा रस्ता आपल्याला कधी ना कधी कुठल्या ना कुठल्या वस्तीपर्यंत घेऊन जाईल अशी खात्री त्याला वाटू लागते.
सुरुवातीच्या दिवसांत त्याला रोज असं वाटत असतं,की आज संध्याकाळी आपण कॅम्पवर पोहोचू.आता ती भावना त्याच्याही नकळत बदललेली असते.'कधी माहिती नाही,पण आपण नक्की सुखरूप पोहोचू' असं तो स्वतःशी म्हणायला लागतो.त्या विचारातच तो दिवसभर चालत राहतो.अखेर अंधार पडतो आणि एकबरीशी जागा शोधून तो तिथे झोपी जातो.आता डास-माश्यांची फिकीर करणं त्याने सोडून दिलेलं असतं.त्याच्या हातांमध्ये माश्या मारण्याएवढेही त्राण उरलेले नसतात.जाग येते तेव्हा उन्हं डोक्यावर आलेली असतात आणि कोणी तरी त्याच्या शेजारी बसून विचित्र भाषेत बोलत असतं.तो वळून पाहतो,तर एक खार जणू त्याची विचारपूस केल्यासारखीच त्याच्याशी बोलत असते.डॉनला वाटतं, 'या जंगलात प्राणी किती वेगळेच वाटतात ! त्यांची भीती वाटत नाही. ते तुमचे मित्र असल्यासारखेच तुमच्या जवळ येतात. असं वाटतं, ते तुम्हाला मदत करू बघताहेत.' ही खार बराच काळ डॉनची सोबत करते. कधी रस्त्यावर,कधी झाडांवरून उड्या मारत.त्या खारीशी गप्पा करत,तिच्या खोड्यांना हसत डॉनच्या वेदना काहीशा कमी होतात.त्याला जाणवतं,की माणसाला कोणत्याही गोष्टीची सवय होऊ शकते.एकटेपणाची,वेदनांची,चालण्याची,
काहीही न खाण्याची... कशाचीही. माणसाकडे सहनशक्ती नेमकी असते तरी किती ? ती संपते तरी कधी ?
थोडं पुढे गेल्यावर डॉनला आणखी काही मानवी खाणाखुणा दिसतात.एक लाकडी केबिन लांबूनच त्याच्या नजरेच्या टप्प्यात येते.आत कोणी तरी फॉरेस्ट गार्ड असेल आणि आता आपली सुटका होईल,या विचाराने त्याचं हृदय उडी घेतं;पण प्रत्यक्षात त्या केबिनमध्ये बहुतेक बऱ्याच वर्षांत कोणी फिरकलेलं नसतं.त्यामुळे तिथे काही खायला मिळेल,ही डॉनची आशाही पूर्ण होत नाही.
त्याला तिथे मिळतं ते एक जुनाट,भयानक कुबट वास येणारं ब्लँकेट.त्या वासाने उलटी होईल असं वाटत असूनही डासांपासून बचाव करण्यासाठी डॉन ते ब्लँकेट सोबत घेतो आणि सकाळी सकाळीच त्या उबदार ब्लँकेटमध्ये स्वतःला गुंडाळून झोपी जातो.त्याला जाग येते ती थेट संध्याकाळीच. एवढी छान झोप त्याला आजवर कधीच लागलेली नसते.तसंही तो रोज रात्र होण्याची वाट पाहत असतो. पुढे अनेकदा लोक त्याला विचारतात,की 'तुला रात्री जंगलामध्ये भीती वाटली नाही का? कधी एकदा सकाळ होते असं तुला व्हायचं का?' त्यावर डॉनचं उत्तर असायचं, "नाही.उलट,मी रात्र होण्याचीच वाट पाहत असे.माश्या-डास आणि चालणं हे तिन्ही इतकं जीवघेणं होतं की त्यापेक्षा रात्रच चांगली वाटायची."
पाच दिवस होऊन गेल्यावर मात्र डॉनचं शरीर ढासळायला सुरुवात होते.अशक्तपणा वाढू लागतो. अंगात ताप भरू लागतो.डोक जड होत.एकदा तर चालता चालता तो चक्कर येऊन पडतोच.जाग येते तेव्हा अंधारून आलेलं असतं.बराच वेळ तो तसाच बसून राहतो.
स्वतःच्या शरीराकडे बघताना त्याला वाटत. हे आपलं शरीर नाहीच.पायाच्या बोटांची नखं तुटली आहेत.सोलवटलेल्या तळव्यांमध्ये काटे घुसलेत. उघड्या पडलेल्या जखमांमध्ये किड्यांनी अंडी घालायला सुरुवात केलीय.कुणाचंही शरीर एवढा त्रास सहन करून पुन्हा चालत राह शकत,यावर त्याचा
स्वतःचाच विश्वास बसत नाही,पण रात्र पडताना पाहन डॉन कसाबसा स्वतःला उठवतो आणि झोपण्यासाठी चांगलं झाड शोधू लागतो.त्याच वेळी त्याला आणखी एक अस्वल दिसतं.ते डॉनकडे पाठ करून चाललेलं असतं,या वेळी अस्वलाला पाहून भीती वाटण्याऐवजी त्याला दुसरा सजीव प्राणी दिसल्याचा आनंदच होतो, ते अस्वल नजरेआड होईपर्यंत तो त्याच्याकडे बघत राहतो. ते जातं तेव्हा एकटेपणाच्या जाणिवेने डॉनला रडू फुटत. जणू तो कायमच जंगलात राहत आलाय आणि प्राणी हेच त्याचे सोबती आहेत.
असेच आणखी दोन दिवस जातात.शेवटच्या दोन दिवसांत आपण नेमकं काय काय केलं याचं डॉनचं भानही कमी होत जातं.चालत राहणं,अशक्य झालं की पडून राहणं आणि रात्र झाली की बरी जागा शोधून झोपणं.डॉन जणू यांत्रिकपणे सगळ्या गोष्टी करत असतो.पण शेवटच्या टप्प्यात डास आणि माशांचा त्रास अगदी असह्य होऊ लागतो.त्याच्या अंगावर जिथे शक्य तिथे,अगदी डोळ्यांच्या पापण्यांना,कानात,नाकात, डोक्यात - सगळीकडे.
पापण्यांनाही त्यांनी चावे घेतले असल्याने डोळे उघडून बघणंही मुश्किल होऊन जातं.
'आपण जंगलाच्या आत चाललोय म्हणून डास वाढलेत की मानवी वस्ती जवळ येतेय म्हणून ?' याचं उत्तर शोधण्याएवढेही डॉनचे विचार स्थिर राहिलेले नसतात.
अशातच एके ठिकाणी डॉनचा पाय दलदलीत फसतो. तिथून बाहेर पडण्यासाठी जेवढी शक्ती लागते तेवढी आता डॉनकडे उरलेली नसते.कसाबसा तो त्यातून बाहेर पडतो.बाहेर येऊन पाहतो तो त्याच्या शरीराला जळवा लगडलेल्या असतात.जेवढ्या शक्य तेवढ्या जळवा ओढून काढता काढता तो इतका दमतो की तसाच वाळूवर पडून राहतो.पण कशा कोण जाणे,उरलेल्या जळवाही त्याचा नाद सोडतात.बराच वेळ स्वच्छ पाण्यात पाय बुडवून बसल्यावर पुन्हा त्याच्या जिवात जीव येतो.पण आता एकेक पाऊल टाकण्यासाठी त्याला शरीरात असलेली सगळी शक्ती एकवटावी लागत असते.डॉनच्याच शब्दांत सांगायचं,तर चालू लागल्यावर पाय निखळून बाजूला पडतील की काय अशी भीती त्याला वाटत असते.आपण कुठे चाललोय.कधी हरवलोय,कधी खाल्लय,आता रात्र आहे की दिवस यातलं काहीच त्याला कळेनासं होतं.आपलं असणं म्हणजे निव्वळ चालणं आहे असं त्याला वाटायला लागतं.अखेर ती वेळ येतेच. की आता एकही पाऊल टाकणं शक्य नसतं.
तो जिथे उभा असतो तिथेच कोसळतो.किती वेळ जातो माहिती नाही.नंतर थोडी शुद्ध आल्यावर त्याला वाटतं की कोणी तरी आपल्याला हाताशी धरून उठवतं आहे. डॉन डोळे उघडून अपेक्षेने बघतो.त्याला वाटतं,अखेर आपल्याला एखादा गाइड किंवा फॉरेस्ट गार्ड भेटलाच म्हणायचा! पण आजूबाजूला कोणीच नसतं.पुढे त्याचे वडील या अनुभवाबद्दल बोलताना म्हणतात,"तुला एखाद्या देवदताने मदत केली असणार." त्यावर डॉन उत्तरतो,"तो मला चक्क ओढूनच नेत होता."
थोड्या वेळाने डॉनला एका झाडाला खिळ्याने ठोकलेलं पोतं सापडत.त्याच्या वरच्या बाजूला छोटं भोक असतं. डॉन ते पोतं डोक्यावरून घेतो आणि त्या भोकातून बघत वाट चालत राहतो.त्यामुळे डास-माश्यांचे हल्ले थांबतात.तोही केवढा मोठा दिलासा असतो ! (या पोत्यानेच आपला जीव वाचवला असं डॉनला वाटत असतं.जंगलातल्या त्या दिवसांची आठवण म्हणून डॉन पुढे स्वतःच्या मृत्यूपर्यंत ते पोतं जपून ठेवतो.) आपण किती दिवस चालतोय हे आता डॉनला आठवेनासं झालेलं असतं.'पण आपल्याला हरवून आठवडा होऊन गेला हे नक्की.लोकांनी आपला शोध घ्यायला सुरुवात केलीच नाही की काय ? केली असेल तर ते आपल्याला अजूनही कसे शोधू शकलेले नाहीत ? आता बहुतेक आपण या जंगलातच राहणार...' असे उलटेसुलटे विचार त्याच्या मनात यायला लागतात.
प्रत्यक्षात डॉन हरवल्याच्या संध्याकाळपासून त्याच्या वडिलांनी आणि गाइड्सनी त्याचा शोध घ्यायला सुरुवात केलेली असते.दोन दिवसांनंतरही तो सापडत नाही म्हटल्यावर बाहेरून बचावकार्य करणाऱ्या तज्ज्ञांची मदत बोलावली जाते.एवढंच नव्हे,तर आसपासच्या परिसरातले शेकडो नागरिक कामगार आपणहून त्याच्या शोधासाठी कटाहदिनच्या जंगलात शिरतात;पण एवढ्या प्रचंड मनुष्यबळाने शोध घेऊनही डॉनचा ठावठिकाणा लागत नाही.कारण तो पूर्ण विरुद्ध दिशेच्या जंगलात भरकटलेला असतो.
नवव्या दिवशी थोडा चालत,थोडा झोपून राहत, बराचसा गुंगीत तो एका नदीच्या काठाशी येऊन पोहोचतो.बघतो तर पल्याड एक छोटं घर दिसतं.पण इथेही कुणीच नसेल तर? किंवा हाही भासच असेल तर? पण थोड्या वेळाने त्याला नदीत होड्या दिसतात. ज्याअर्थी होड्या आहेत त्याअर्थी घरात माणसं राहत असणार,असा विचार करत असतानाच घरातून एक माणूस बाहेर येतो.त्याला बघून डॉन जोरजोरात ओरडायला सुरुवात करतो.त्या माणसाला सुरुवातीला एखादा प्राणी किंवा घुबड ओरडतं आहे असंच वाटतं, पण अखेर त्याचं डॉनकडे लक्ष जातं.मग मात्र जराही वेळ न दवडता तो डॉनच्या मदतीला धावतो.पाचव्या मिनिटाला डॉनला सुखरूप घरात आणलं गेलेलं असतं. हरवल्यापासून तब्बल नवव्या दिवशी डॉन पुन्हा माणसांत येतो.लवकरच आई-वडिलांपाशीही पोहोचतो. डॉन नऊ दिवसांनंतर सापडला असला तरी त्याला स्वतःला मात्र आपण फक्त सातच दिवस भटकत होतो असं वाटत असतं.नंतर त्याला जेव्हा विचारलं जातं,की 'तू दिवस का मोजले नाहीस?' तेव्हा त्याचं उत्तर असतं,"मला रोज वाटायचं की आज रात्री मी नक्की कॅम्पवर पोहोचेन !"
या नऊ दिवसांच्या काळात डॉनने मनाची जी हिंमत दाखवली ती तर अविश्वसनीय आहेच,पण त्याची पायपीटही थक्क करणारी आहे.डॉनच्या प्रवासाचे सगळे तपशील ऐकल्यावर कटाहदिनच्या गाइड्सनी त्याच्या भटकंतीचा नकाशा तयार केला.त्यांच्या मते डॉन रोज तब्बल २० ते २५ किलोमीटर चालत होता.म्हणजे नऊ दिवसांत कॅम्पच्या विरुद्ध दिशेने त्याने तब्बल १८० ते २०० किलोमीटर पायपीट केली होती.कोणाचीही सोबत नसताना केवळ स्वतःच्या हिमतीवर एका बारा वर्षांच्या मुलाने स्वतःचा जीव वाचवण्यासाठी केलेलं हे साहस म्हणजे माणसाच्या चिवट जीवनासक्तीचं प्रतीक म्हणायला हवं.