* विजय गायकवाड | Vijay Gaikawad

live

नमस्कार आपले स्वागत आहे. मी पुस्तके आणि मित्रांवर पैसे खर्च करतो,माझ्याकडे दगड आणि विटांवर खर्च करण्यासाठी पैसे नाहीत.- रस्किन बाँड.ही थोर माणसं व त्यांचे विचार मला पुस्तकात भेटलीत.ती भेटली आणि त्यांनी सांगितले कि, प्रत्येक दिवशी असं काही तरी करा की,ते तुम्हाला अधिक सुंदर उद्याच्या दिशेने खूप लांबवर घेऊन जाईल."- डोग फायरबाऊ.' सर्वियन कादंबरीकार मिलोराद पावीच यांचे एक वाक्य आहे ते म्हणतात - जोवर जगात पुस्तक वाचणाऱ्या वाचकांची संख्या बंदूकधारी सैनिका पेक्षा अधिक आहे तोवर काळजीच काहीच कारण नाही.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात.पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये.म्हणून अविरतपणे प्रयत्न करणारे मार्गदर्शक, मित्र धावून येतात.प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,डॉ.दीपक शेटे,आ.भरत बुटाले,प्रा.सर्जेराव राऊत,सुभाष ढगे,अनिल फारणे,डॉ.सुधीर सरवदे ,विश्वास खाडे, विनायक पाटील,संजय कुंभार,सतीश खाडे,मनोहर सुर्वे,गणेश खंदारे,तात्या गाडेकर, दादासाहेब गाडेकर, दादासाहेब ताजणे, पुस्तकातील घटना प्रसंग सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील यांनी केलेले आहे. मला लिहिण्याची प्रेरणा देणारी पुस्तके,लेखक,प्रकाशक,मित्र ही जगावेगळी माणसं माझ्या जीवनातील महत्वाचा टप्पा आहेत.... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ.मेघा गायकवाड, चिरंजीव मयान,माझ्या धावण्यातील गुरुवर्य नामदेव बरुरे,लुल्ला शेख मोठी ताई ,लहान ताई जयश्री शिंदे या सर्वांचेच मनापासून आभार व धन्यवाद मॅट्रिक फेल विजय गायकवाड

२३/९/२३

बिबळ्याचा पहिला बळी… Leopard's first victim...

मी रुद्रप्रयागला येण्याअगोदर इबॉटसनने अतिशय सुनियोजित असा एक हाकारा घालण्याची योजना केली होती.जर तो यशस्वी झाला असता तर पुढे जवळजवळ पंधरा माणसांचा जीव वाचला असता.हा हाकारा आणि त्याच्याशी संबंधित घटना खास उल्लेख करण्यासारख्या आहेत.


बद्रीनाथकडे निघालेल्या वीस यात्रेकरूंचा घोळका एकदा संध्याकाळी एका रस्त्यालगतच्या दुकानावर येऊन पोचला.त्यांच्या सर्व गरजा भागवल्यानंतर त्यांना दुकानदाराने सांगितलं की आता लवकरच अंधार पडेल आणि चार मैलावरच्या पिलग्रिम शेल्टर्सपर्यंत वेळेवर पोचायचं असेल तर त्यांना ताबडतोब निघावं लागेल.तिथे एकदा पोचलं की त्यांना कोणताही धोका नाही,त्यांच्या राहण्याजेवणाची सुद्धा चांगली सोय होईल.पण हा सल्ला त्या यात्रेकरूंना काही केल्या पटेना.त्यांचं म्हणणं असं होत की त्यांनी सकाळपासून खूप लांबचा पल्ला मारला होता आणि आता यापुढे परत ४ मैल चालणं अशक्य आहे.त्यांना फक्त जेवण बनवण्यासाठी थोडी जागा हवी होती आणि दुकानाबाहेरच्या पडवीत झोपण्याची परवानगी! यावर मात्र दुकानदाराने जोरदार विरोध दर्शवला.त्याने सांगितलं की त्याच्या दुकानाच्या आसपास तो बिबळ्या सतत येत असतो आणि तिथे उघड्यावर झोपणं म्हणजे मृत्यूला आमंत्रण देण्यासारखं आहे.


ही सगळी वादावादी चालू असतानाच बद्रीनाथकडे चाललेला एक साधू तिथे आला आणि त्याने यात्रेकरूंची बाजू मांडायला सुरुवात केली.तो म्हणाला की जर दुकानदाराने त्यांच्यापैकी स्त्रियांना दुकानात निवारा दिला तर तो पुरुषमंडळींबरोबर बाहेर ओसरीवर झोपेल आणि जर कुठला बिबळ्या - नरभक्षक असो किंवा नसो तिथे आला आणि यात्रेकरूंशी काही आगळीक केली तर तो त्याला तोंडाने आख्खा गिळेल व फाडून टाकेल.या असल्या प्रस्तावासमोर दुकानदाराला मान झुकवावी लागली.शेवटी दहा बायकांना त्याच्या दुकानाच्या आत निवारा मिळाला व साधूला मधोमध ठेवून ती दहा माणसं ओसरीवर आडवी झाली.


सकाळी उठल्यावर यात्रेकरूंना दिसलं की साधू तिथून गायब आहे,त्याचं अंथरूण विस्कटलेलं आहे,त्याने पांघरली चादर ओसरीच्या अर्धी आत आणि अर्धी बाहेर फरफटत गेली आहे व त्यावर रक्ताचे डाग आहेत.या सर्वांचा गलका ऐकून दुकानदार बाहेर आला.एका दृष्टीक्षेपातच त्याला काय झालंय ते कळलं.उन्हं नीट वर आल्यावर त्या सर्वांबरोबर दुकानदाराने रक्ताचा माग कुठे गेलाय ते बघितलं.तो माग डोंगरउतारावर काही अंतर जात तीन सोपानशेतं ओलांडून सर्वात खालच्या शेताच्या बांधापर्यंत गेला होता.त्या उभ्या बांधाच्या कडेला त्यांना साधू सापडला. त्याच्या शरीराच्या खालचा भाग बिबळ्यानं खाल्ला होता.


त्यावेळी इबॉटसनचा मुक्काम रुद्रप्रयागलाच होता आणि तो नरभक्षकाचा ठावठिकाणा शोधण्याच्या प्रयत्नात होता.त्याच्या मुक्कामाच्या काळात कोणताही नरबळी गेला नव्हता.त्यामुळे त्याने अलकनंदा नदीच्या पलीकडच्या जंगलाच्या एका छोट्या पट्ट्यात हाकारा घालायचा बेत केला होता.दिवसा त्या बिबळ्याचं पडून राहण्याचं ठिकाण त्या जंगलात असावं असा गावकऱ्यांचा कयास होता आणि याच अंदाजाच्या आधारावर हा बेत त्याने केला होता. त्यामुळे आदल्या दिवशी ते वीस यात्रेकरू पाय ओढत दुकानाच्या दिशेने चालत होते त्यावेळी पटवारी व इबॉटसनचा नोकरवर्ग आसपासच्या गावात फिरून दुसऱ्या दिवशीच्या हाकाऱ्यासाठी सकाळी तयार राहायला बजावत होते.


दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर ब्रेकफास्ट करून इबॉटसन,त्याची पत्नी आणि एक मित्र ( त्याचं नाव मला आता आठवत नाहीये) त्यांच्या मागे काही नोकर व हाकारा घालणारी जवळजवळ दोनशे माणसं रुद्रप्रयागचा झुलता पूल ओलांडून नदीपलीकडे मैलभर अंतर कापून डोंगर चढले आणि हाकायासाठी जागा घेतल्या.हाकारा चालू असतानाच इबॉटसनच्या रनरने साधूच्या बळीची बातमी आणली.आता हा निश्चितपणे रिकामा जाणारा हाकारा थांबवला गेला आणि उभ्याउभ्याच पुढे काय करायचं याची योजना आखली गेली.या योजनेनुसार इबॉटसन आणि पार्टी दोनशे हाकाऱ्यांना घेऊन चार मैलांवरच्या एका झुल्यावरून अलकनंदा ओलांडून परत मागे वळून त्या बळीच्या ठिकाणी आली तर त्याचा नोकरवर्ग डोंगराच्या रस्त्याने वाटेवरच्या गावांमध्ये जेवढी माणसं जमवता येतील तेवढी जमवत दुकानावर आली.

दुपारपर्यंत जवळजवळ दोन हजार माणसं जमली आणि दुकानाच्या वरच्या बाजूच्या डोंगरावर वरपासून खालपर्यंत हाकारा घालण्यात आला.ज्यांना इबॉटसन काय चीज आहे. हे माहिती असेल त्यांना निश्चित कल्पना येईल की हा हाकारा किती योजनाबद्ध पार पडला असेल.हाही हाकारा रिकामा गेला त्याचं एकमेव कारण म्हणजे त्यावेळी बिबळ्या त्या भागात नव्हताच.


जेव्हा एखादा वाघ किंवा बिबळ्या स्वतःहून त्याचं भक्ष्य असं उघड्यावर सोडून देतो तेव्हा त्याचं त्या भक्ष्यामधलं स्वारस्य संपलं आहे हे गृहीत धरायला हरकत नसते.

अशावेळी तो भक्ष्यावर एकदाच भरपेट ताव मारून दोन-तीन मैल दूर एकांतात जाणं पसंत करतो;नरभक्षक असेल तर दहा- दहा मैल सुद्धा! त्यामुळे ही शक्यता होती की जेव्हा ते जंगल विंचरून काढलं जात होतं तेव्हा तो बिबळ्या दहा-बारा मैल दूर कुठेतरी गाढ झोप घेत असणार.


'नरभक्षक बिबळे' ही अपवादात्मक जनावरं आहेत.त्यामुळे त्यांच्याबद्दल फारशी माहिती उपलब्ध नसते. (मॅनइटींग लेपर्ड ऑफ रुद्रप्रयाग मूळ लेखक - जिम कॉर्बेट,अनुवाद - विश्वास भावे,आरती प्रकाशन )


माझा स्वतःचा याबाबतीतला अनुभव खूपच मर्यादित होता,फार वर्षापूर्वी फक्त एका नरभक्षक बिबळ्याशी झालेला संपर्क इतपतच; व तोही फारच थोड्या काळाकरता.त्यामुळेच नरभक्षक बनल्यावर बिबळ्यांच्या सवयी बदलतात हे जरी मला माहीत असलं तरी किती प्रमाणात त्या बदलल्या असतील याचा अंदाज करणं अशक्य होतं.त्यामुळे निदान पहिले काही दिवस तरी इतर बिबळ्याच्या शिकारीसाठी ज्या पद्धती वापरल्या जातात त्याच पद्धतीचा उपयोग करायचं मी ठरवलं.


सर्वांत जास्त वापरल्या जाणाऱ्या पद्धती म्हणजे बिबळ्याने केलेल्या भक्ष्यावर किंवा त्यांच्यासाठी बांधलेल्या जिवंत जनावराजवळ जागा घेऊन बसणे;

शक्यतो बोकड किंवा मेंढा ! पण यापैकी पहिली पद्धत वापरायची असेल तर भक्ष्याचा शोध लागणं महत्त्वाचं असतं आणि दुसऱ्या बाबतीत बिबळ्याचा ठावठिकाणा शोधणं आवश्यक असतं.माझा रुद्रप्रयागला जाण्याचा मुख्य हेतू यापुढील मनुष्यहानी बंद करणं हा होता त्यामुळे बिबळ्या पुढचा नरबळी घेईल याची वाट बघणं चूक होतं.

साहजिकच एकच गोष्ट माझ्या हातात होती ती म्हणजे काहीही करून त्याचा ठावठिकाणा शोधणे,त्याला संपर्कात आणणे,एखादं जनावर आमिष म्हणून बांधणे आणि त्याच्याजवळ बसून संधीची वाट बघणे.या इथेच माझ्यासमोर फार मोठी अडचण उभी राहीली की जिच्यावरचा तोडगा आज ना उद्या निघणारच होता.मला दिलेल्या नकाशावरून कळत होतं की या नरभक्षकाचा वावर जवळजवळ पाचशे चौ.मैल एवढ्या मोठ्या प्रदेशात होता.कुठेही पाचशे चौ.मैल एवढ्या प्रदेशात एखादं विशिष्ट जनावर हुडकून त्याची शिकार करणं मोठं अवघड काम होतं.इथे तर हा सर्व प्रदेश डोंगराळ आणि रौद्र होता. अशा भागात एखादं जनावर तेही संपूर्ण निशाचर.. शोधणं मला तर प्रथमदर्शनी अशक्यप्राय वाटलं.पण नंतर ह्या प्रदेशाला समान भागात विभागणाऱ्या अलकनंदा नदीचा विचार मनात आला.


सर्वसाधारणपणे लोकांचा असा समज होता की ही नदी बिबळ्याला कोणताही अडथळा निर्माण करू शकत नाही आणि जेव्हा नदीच्या एका अंगाला शिकार मिळणं अवघड पडतं तेव्हा तो ही नदी पोहून पार करतो.माझा या गोष्टीवर अजिबात विश्वास नव्हता.माझ्या मते कोणताही बिबळ्या कोणत्याही परिस्थितीत स्वतःला बर्फासारख्या थंड आणि फेसाळत्या वेगवान प्रवाहात झोकून देणार नाही.त्यामुळे जेव्हा म्हणून बिबळ्या एका तीरावरून दुसऱ्या तीरावर जात असेल तेव्हा तो कोणत्यातरी झुलत्या पुलावरूनच नदी ओलांडून जात असणार.


असे दोन पूल या भागात होते.एक रूद्रप्रयागमध्येच होता आणि दुसरा रुद्रप्रयागपासून वरच्या अंगाला बारा मैलांवरच्या 'चटवापिपल' इथे होता.या दोन पुलांच्या मध्ये एक झुला होता. हाच तो झुला... ज्यावरून इबॉटसन व त्याच्या पार्टीने हाकाऱ्याच्या दिवशी नदी ओलांडली होती.एक उंदीर सोडला तर इतर कोणत्याही प्राण्याने ओलांडला नसेल असा हा ब्रिज म्हणजे आजपर्यंत मी पाहिलेल्यांपैकी सर्वांत भयानक चीज होती.हाताने वळलेल्या, धुक्यामुळे आणि जुन्या झाल्याने,काळपट पडलेल्या गवताच्या दोन समांतर केबल्स जवळजवळ दोनशे यार्ड रुंदीच्या फेसाळत्या, बर्फासारख्या थंड आणि वेगवान पात्रावरून पलीकडे गेल्या होत्या.हा प्रवाह पुढे शंभर याडीवर दोन खडकांच्या भिंतीमध्ये मोठ्या गर्जना करून आदळत होता.इथेच एकदा पाठलागावर असलेल्या रानकुत्र्यांपासून जीव वाचवण्यासाठी एका भेकराने जीवाच्या आकांताने लांब झेप घेऊन नदी ओलांडली असल्याची कथा ऐकिवात होती.या दोन समांतर केबल्समध्ये पावलं ठेवण्यासाठी गवताच्याच सैलसर दोरांनी बांधलेल्या इंच अर्धा इंच रुंदीच्या व विषम लांबीच्या कामट्या शेवटपर्यंत जात होत्या.हा एवढा भयानक प्रकार कमीच वाटला म्हणून की काय कोण जाणे पण त्यातली एक केबल जरा सैल पडली होती आणि त्यामुळे या सर्व कामट्यांचा केबलशी ४५" चा कोन झाला होता.जेव्हा मी ह्या भीषण झुल्याला पहिली भेट दिली तेव्हा मी तिथे टोल घेणाऱ्या माणसाला "ह्या झुल्याची कधी तपासणी किंवा डागडुजी केली आहे का?" हे विचारण्याचा मूर्खपणा केला होता.एका पैशाच्या मोबदल्यात माझं आयुष्य खर्ची घालण्याची परवानगी देताना तो माझ्याकडे चमत्कारिक नजरेने बघत म्हणाला की या झुल्याची तपासणी वगैरे कधी होत नाही पण पूर्वी एकदा त्यावरून जाणाऱ्या कोणा एका माणसाच्या वजनाने तो जेव्हा तुटला तेव्हा तो बदलून दुसरा झुला लावण्यात आला आहे. हे ऐकल्यानंतर माझ्या मणक्यातून जी थंड शिरशिरी गेली ती मी पलीकडे जाईपर्यंत तशीच राहीली.


तर असा हा झुला ओलांडणं ही नरभक्षकाच्या आवाक्याबाहेरची गोष्ट होती.आता उरले दोन झुलते पूल!मला आता खात्री पटली की जर मी ते दोन पूल बंद करू शकलो तर बिबळ्याला नदीच्या एका बाजूला स्थानबद्ध करू शकेन आणि माझं काम निम्म्याने हलकं करू शकेन.


आता पहिलं काम हे होतं की याक्षणी बिबळ्या नदीच्या कोणत्या बाजूला आहे हे तपासणे, शेवटचा म्हणजेच त्या साधूचा बळी हा चटवापिपल पुलापासून जवळच एका गावात नदीच्या डाव्या अंगाला झाला होता. ह्या घटनेनंतर साहजिकच सर्व लोकांनी खबरदारीचे उपाय दुपटीने जारी केले असणार त्यामुळे बिबळ्याने निश्चित नदी ओलांडलीच असणार पण हे वाचल्यावर तुम्ही विचाराल की इतकी खबरदारी घेऊनसुद्धा एका गावात पाच पाच बळी कसे गेले? मी एवढंच उत्तर देऊ शकतो की अशी सावधानता व प्रयत्न सतत करण्यालाही मर्यादा असतात.

इकडची घरं खूप छोटी आहेत आणि त्यात संडास वगैरेची सोय नसते.त्यामुळे नरभक्षक आपल्यापासून दहा-पंधरा मैल दूर आहे असं कळल्यावर एखादा माणूस,बाई किंवा मूल निसर्गनियमांनुसार आणीबाणीच्या परिस्थितीत एखाददुसरा क्षण दरवाजा उघडण्याचा धोका पत्करणं साहजिक आहे आणि ज्या संधीसाठी नरभक्षक कदाचित कित्येक रात्री वाट बघत असेल ती संधी त्याला मिळत असणार..!


२१/९/२३

कीटकांच्या अद्भुत जगात In the wonderful world of insects

महाभारतात मांडव्य ऋषींचा उल्लेख आहे. प्राचीन भारतातील तो पहिला कीटकशास्त्रज्ञ.काट्याच्या टोकाला कीटक टोचून,त्यांचा संग्रह करून,त्याविषयी तो संशोधन आणि अभ्यास करी.मांडव्य ऋषी करीत असलेली जीवहत्या त्या काळातील समाजातील प्रतिष्ठितांना आवडली नाही.त्यांनी राजाचे कान त्याच्याविरुद्ध भरून त्याला सुळावर चढवून ठार केलं.वयाच्या एकविसाव्या वर्षी चालू केलेल्या या साधनेचा शेवट त्याच्या (३३) तेहतिसाव्या वर्षी झाला.भारतातील एका कीटक

शास्त्रज्ञाचा हा शोकान्त पाहून नंतर कोणी अशा प्रयोगात लक्ष घातलं नसावं मात्र पाश्चात्त्य देशांत याविषयीचा पाठपुरावा होत होता.सृष्टिपदार्थज्ञानी ॲरिस्टॉटल यानं कीटकांविषयी आपल्या ग्रंथांतून माहिती दिली आहे.


फ्रान्समध्ये अठराव्या शतकात रूमर हा कीटकशास्त्रज्ञ झाला;परंतु कीटकासारख्या अतिक्षुद्र जीवाचा अभ्यास करण्यात त्यानं कालापव्यय करावा,याबद्दल त्या काळातील समाजानं त्याची हेटाळणी केली.रूमर त्यामुळं निराश झाला नाही.कीटकांविषयीचं शोधकार्य चालू ठेवून,'नॅचरल हिस्ट्री ऑफ इन्सेक्ट्स' या विषयावर त्यानं बारा खंड लिहून काढले. त्याच्या हयातीत फक्त पहिला खंड प्रसिद्ध झाला.त्या वेळच्या कुरिअरसारख्या नामवंत कीटकशास्त्रज्ञानं रूमरचं लेखन अनावश्यक म्हणून निकालात काढलं होतं.


रूमरच्या मृत्यूनंतर एकशेसाठ वर्षांनी विलियम मार्टिन व्हीलर यानं इ. स. १९२६ मध्ये त्याची हस्तलिखितं वाचली, तेव्हा त्याला ती अतिशय महत्त्वाची वाटली.त्यानं ती फ्रान्समधील सायन्स अ‍ॅकॅडमीतर्फे प्रसिद्ध केली.याच शतकात जे. एच.फेबर या फ्रेंच निसर्गतज्ज्ञाचा उदय झाला. होमर महाकाव्याची रचना करून अजरामर झाला तसेच,फेबरनं कीटकांवर काव्यमय लेखन केलं,म्हणून तो 'इन्सेक्ट होमर' म्हणूनही ओळखला जातो.

कीटकांविषयीची त्याची पुस्तकं जगभर वाचली जातात. इ.स.१९१५ मध्ये वयाच्या ब्याण्णव्या वर्षी त्याचं निधन झालं. तरुण फेबरविषयी डार्विननं एका ठिकाणी म्हटलं आहे की,फेबरच्या अदम्य निरीक्षणशक्तीचं कोणीच अनुकरण करू शकणार नाही.फेबर निसर्गाशी तादात्म्य पावला होता. फेबर एकदा म्हणाला,'जर डासांविषयी आपणाला परिपूर्ण ज्ञान प्राप्त होऊ शकलं, तर मानवी जीवनाचा इतिहास पुसून टाकावा लागेल.'


सॉक्रेटिसच्या शब्दांत सांगायचं म्हणजे-

'What I know best of all is that I know nothing.' (मला सर्वात चांगले माहित आहे की मला काहीही माहित नाही.')


कीटकांच्या वर्तणुकीविषयी फेबरचा व्यासंग मोठा होता.भुंगोरा,कोळी,मधमाशा,गांधीली, अळी यांचं तो निरीक्षण करीत राहिला.या कीटकसृष्टीविषयी अतिशय साध्या,सरळ,सोप्या आणि चित्रमय भाषेत त्यानं लिहिलं.कीटकांविषयीचं त्याचं समग्र वाड्मय दहा खंडांतून प्रसिद्ध झालं आहे.'वंडर्स ऑफ इन्स्टिंक्ट' हा त्याचा ग्रंथ जगप्रसिद्ध आहे.प्रसिद्ध बेल्जियन नाटककार आणि कवी मॉरिस मेटरलिंक याची ख्याती जगातील साहित्य क्षेत्रात मोठी आहे. 'द लाइफ ऑफ द बी' हा मधमाशांविषयी,तसेच,'द लाइफ ऑफ द व्हाइट

अ‍ॅन्ट' हा वारूळ आणि वाळवी यांच्याविषयी ग्रंथ त्यानं लिहिला.ललित लेखनाद्वारे त्यानं शास्त्र सांगितलं.

अमेरिकन शास्त्रज्ञ एडविन वे टील याचा मधमाशांवरील 'गोल्डन थ्रॉंग' हा ग्रंथ अद्वितीय आहे;परंतु मेटर-लिंकचा ग्रंथ अनेक दृष्टींनी टील याच्या ग्रंथापेक्षा उत्तम आहे.

आणखी एक थोर कीटकशास्त्रज्ञ आणि लेखक युजिन माराइस याचा उल्लेख करावा लागेल. 'द सोल ऑफ द व्हाइट अ‍ॅन्ट' हा त्याचा ग्रंथ अभूतपूर्व आहे.


आपल्याकडे आर.के.नारायण आणि खुशवंत सिंग यांनी प्रसंगानुसार कीटकांविषयी इंग्रजीतून लालित्यपूर्ण लेखन केलं असलं,तरी ते जिज्ञासा आणि कुतूहल यांपोटी केलं आहे.शास्त्राचा त्याला आधार नाही.कीटकशास्त्रासारख्या क्षुल्लक वाटणाऱ्या विषयाकडं कोणी सहसा वळत नाही.

शिवाय आपले कीटकशास्त्रज्ञ त्याविषयी इतकं क्लिष्ट शास्त्रीय विवेचन करीत असतात,की ते सारं वाचकांच्या डोक्यावरून जातं.परिणामतः त्याविषयी अरुची निर्माण होते. अलीकडं कृषिविज्ञानाशी संबंधित असलेल्या कीटकांविषयी माहिती प्रसिद्ध होत असते.आश्चर्य म्हणजे,कीटकांची मराठी नावं आणि त्यांविषयीचा सोपा पारिभाषिक कोश अजूनही निर्माण होऊ शकलेला नाही.वनाधिकारी म्हणून नोकरीच्या सुरुवातीला मी डॉ.सालीम अली या प्रसिद्ध पक्षिशास्त्रज्ञाच्या सहवासात आलो. त्यांच्याबरोबर पक्षिनिरीक्षण करीत असता ते म्हणायचे,'चितमपल्ली,तुम्हांला माहीत आहे ना? पक्षिशास्त्र हे अनेक शास्त्रांचं शास्त्र आहे. पक्षितज्ज्ञांना वनस्पतिशास्त्राची,तशीच कीटकशास्त्राची माहिती पाहिजे.

त्यांना वनं आणि वनांचे प्रकार यांविषयी ज्ञान हवं. भूगोलाचा अभ्यास हवा.रसायन आणि भौतिक शास्त्रांचा परिचय पाहिजे.गणिताकडही दुर्लक्ष करून चालणार नाही.'रानकोंबड्या,चकोत्री, लावा,तित्तिर आणि रानबदकं या मृगयायोग्य पक्ष्यांच्या खाद्यसवयींचा अभ्यास करताना मला त्यांच्या पोटातून वनस्पतीच्या बियांबरोबर अनेक प्रकारच्या कीटकांचे अवशेष आढळून येत.त्या वेळी फारशी माहिती नव्हती.कोइमतूर फॉरेस्ट कॉलेजमध्ये असताना झाडांचे शत्रू असलेल्या कीटकांचा परिचय करून देण्यात आला होता. पुण्यात मी वनसंशोधन केंद्रात काम करीत असताना आपल्याला कीटकांविषयी सखोल शास्त्रीय ज्ञान असावं,हे प्रकर्षानं जाणवलं,तेव्हा मी विचार केला,दोन-तीन वर्षांची अध्यासन रजा घेऊन या शास्त्राचा विद्यापीठात अभ्यास करावा; परंतु अनेक कारणांमुळं ते शक्य झालं नाही.परंतु कीटकांच्या अदभुत जीवनाविषयी माझ्या मनात जिज्ञासा होती.या रुचीतूनच मी ॲरिस्टॉटल,

फेबर,मेटरलिंक,टील आणि जेराल्ड ड्युरेल यांची पुस्तकं वाचली.त्यातूनच कीटकांचं जग पक्ष्यांच्या जगापेक्षाही गूढरम्य असल्याची प्रचीती आली.पक्षिनिरीक्षणाबरोबर मी वेळ मिळेल,तेव्हा कीटकांचं देखील जंगलभटकंतीत अवलोकन करू लागलो.त्यांच्या जीवनदर्शनानं मी थक्क झालो.एस. एच. स्केफ या कीटकशास्त्रज्ञाला एका मुलाखतीत विचारण्यात आलं की,


'तुम्ही जर मानव नसता,तर कोणत्या प्राण्याचा जन्म घेणं तुम्हांला आवडलं असतं ?


त्यावर स्केफ म्हणाला,


'मला कालव-शिंपला (ऑइस्टर) व्हायला आवडेल. '


हे त्याचं उत्तर ऐकून परीक्षकाला आश्चर्य वाटलं. त्यांनी विचारलं, 'का बरं?'


'कारण कालव-शिंपल्याच्या जीवनाला नर म्हणून सुरुवात होते.नंतर त्याचं रूपांतर मादीत होतं अन् शेवटी तो अर्धनारीनटेश्वर होतो.जीवनाच्या सर्व थरांच्या अनुभवांतून तो जातो.त्यामुळं संपूर्ण जीवनाविषयीचं ज्ञान त्याला अवगत होतं.' परीक्षकांना हे उत्तर आवडलं,हे सांगायला नकोच.


कीटकांच्या जीवनाविषयी अभ्यासाला कोठून आणि कशी सुरुवात करावी,हेच लक्षात येत नाही.आजूबाजूचा सारा परिसर नाना अवस्थांतून जाणाऱ्या,उडणाऱ्या,गाणाऱ्या,गुणगुणणाऱ्या रंगीबेरंगी कीटकांनी व्यापलेला आहे.सुमारे ७०,००,००० प्रकारच्या कीटकांची ओळख झाली आहे दर वर्षी त्यात नवनवीन कीटकांच्या जातींची भर पडत असते.या भूतलावर अस्तित्वात असणाऱ्या प्राणि

जगतापेक्षा तिपटीनं कीटकांच्या जाती आहेत.


डायनोसोर अस्तित्वात होता,तत्पूर्वी तीनशे कोटी वर्षांपासून कीटकसृष्टी पृथ्वीवर आहे.त्यांच्या आवाजानं आजूबाजूचं वातावरण भरलेलं आहे. अभयारण्यात जाणाऱ्या पर्यटकांना आणि विद्यार्थ्यांना वाघ,सिंह,हत्ती,

गेंडे पाहायचे असतात.त्यांचं लक्ष चुकूनही या अदभुत कीटकांच्या जगाकडं जात नाही.


माझ्यासारखा पक्षिप्रेमी जंगलातील ओढ्याकाठी हिंडताना कीटकांचं अनायासे दर्शन झाल्यावर त्यांना अधिक वेळ न्याहाळीत असतो.


एक दिवस ओढ्याच्या काठानं जात असता शिकारी गांधीलमाशी उडताना दिसली.मी तिच्याकडं पाहू लागलो.

तिनं तोंडात अळी धरली होती.उडत- उडतओढ्याकाठच्या भुसभुशीत दरडीवर असलेल्या बिळातील घरट्याकडं ती जात होती.तिच्या तोंडातील अळी गांधीलमाशीपेक्षा आकारानं मोठी होती.गांधीलमाशीनं मला पाहिलं असावं.

कारण घरट्याजवळ येताच ती क्षणभर अस्वस्थपणे पिंगा घालू लागली.नंतर ती बिळाजवळ अलगद उतरली.

घरट्याचं छिद्र तिनंच तयार केलं होतं.पुढच्या पायानं माती उकरून ती मागच्या पायानं बाहेर काढून टाकीत होती.


मी तिच्याकडे एकाग्रतेनं पाहात होतो.वळसे घेत गेलेल्या छिद्रात बेशुद्धावस्थेत असलेल्या अळीसह तिनं प्रवेश केला.सुरक्षित ठिकाणी त्या अळीला ठेवून ती त्यावर अंडी घालणार होती. अतींद्रिय ज्ञानाच्या साह्यानं ती नांगीनं अळीच्या छातीजवळ असलेल्या मज्जातंतू केंद्रावर असा काही नियंत्रित दंश करते,की भक्ष्य तर जिवंत राहावं;मात्र त्याची हालचाल होऊ नये.अशा अवस्थेत अळी निश्चेष्ट पडली असता,अंड्यांतून बाहेर येणाऱ्या अर्भकांना अनायासे भोजन मिळतं.तसेच,ती सुरक्षितही राहतात.

पाखरमाया - मारुती चितमपल्ली,साहित्य प्रसार केंद्र सीताबर्डी,नागपूर


अळी आत ठेवून ती नंतर बाहेर उडत आली.घरट्याचं छिद्र तिनं रेतीच्या कणांनी बंद केलं. घरट्याचा मागमूस लागू नये,तसेच आजूबाजूच्या वातावरणाशी ते एकरूप व्हावं,म्हणून गवताच्या काड्या घरट्याभोवती तिनं टाकल्या आणि ती तिथून निघून गेली.नंतर योग्य वेळी परत येताना ती तोंडात वाळूचा खडा आणून या घरट्याचा बंद दरवाजा फोडते.


मी मनात विचार करीत होतो की,


'शिकारीसाठी दूरवर गेल्यावर गांधीलमाशी आपलं घरटं पुन्हा कशी शोधून काढीत असेल? तिला दिशांचं ज्ञान कसं होत असेल ? गांधीलमाशी परत या घरट्याकडं येईल,तेव्हा आतील अर्भकाचं रूपांतर पंख फुटलेल्या गांधीलमाशीत झालेलं असेल का?'


परवा मी केशिराज संकलित 'दृष्टांत पाठ' वाचताना भींगरुटीएचा दृष्टांत वाचून थक्क झालो.


भींगरुटी असे : ते कीटकीतें पाहे: 

धरी : कांटा रोवी :

नेऊनि आपुलेया घरांतु घाली : दार 

लींपौनि जाए ।

एउनि मागुती मातें खाईल म्हणौनि 

भेणें तीएतें चींती :

चिंतीत चिंतीतां तीसीहि पाख नीगति :

तेही तीएसारीखी होए ।। (९६)


मला असं सांगायचं नाही,की महानुभाव पंथातील अनुयायांना शास्त्रीय दृष्टी होती; परंतु रानावनांतून भटकंती करणाऱ्या महानुभावांच्या नजरेतून गांधील

माशीविषयीचं निरीक्षण सुटलं नव्हतं.त्यांनी ते सहज पाहिलं.परमेश्वर आणि भक्त यांविषयीचं जे तत्त्वज्ञान सांगायचं ते गांधीलमाशी व अळी यांच्या साह्यानं त्यांनी अतिशय काव्यमय शैलीत सांगितलं आहे,ते मला खूप आवडलं.

१९/९/२३

टायटॅनचा अंत:स्फोट Titan's heart explodes

सन १९१२ मध्ये 'टायटॅनिक' अटलांटिक महासागराच्या तळाशी गेली.तिचे अवशेष पाहण्यासाठी पर्यटकांना घेऊन जाणारी 'टायटॅन' ही सबमर्सिबलही अंत:स्फोट होऊन या वर्षी टायटॅनिकच्या जवळच बुडाली.या दुर्घटनेची माहिती आणि कारणमीमांसा देणारा हा लेख..


टायटॅनिक :  मित्रहो,आपल्या सगळ्यांना टायटॅनिक सिनेमा अगदी सुपरिचित आहे.जेम्स कॅमेरुन या सुप्रसिद्ध दिग्दर्शकाने दिग्दर्शित केलेला आणि लिओनाडों डी काप्रियो आणि केट विन्स्लेट या जोडीचा अभिनय असलेल्या या १९९० सालातील चित्रपटाने अख्ख्या जगातल्या तरुणाईला वेड लावले होते.यात कहाणी होती ती टायटॅनिक या,त्या काळातल्या सर्वांत मोठ्या आणि जी कधीही बुडू शकणार नाही असा दावा केला जाणाऱ्या प्रवासी आगबोटीची..


टायटॅनिकचे जलावतरण उत्तर आयर्लंडमधील साउथहँप्टन इथे दि.३१ मे,१९१९ रोजी झाले. दि.१० एप्रिल,१९१२ रोजी तिने अमेरिकेतील न्यूयॉर्कला जाण्यासाठी तिच्या पहिल्या प्रवासाला सुरुवात केली.या राजेशाही बोटीवर २,२४० प्रवासी आणि कर्मचारी होते.

दुर्दैवाने एका हिमनगावर आपटून ही "कधीही न बुडू शकणारी बोट तिच्या पहिल्याच प्रवासात दि.१५ एप्रिल,

१९१२ रोजी अटलांटिक महासागराच्या तळाशी गेली.या दुर्घटनेत १५०० व्यक्तींना जलसमाधी मिळाली.


बुडाल्यानंतर टायटॅनिक कॅनडाच्या न्यूफाउंडलँडच्या किनाऱ्यापासून सुमारे साडेतीनशे किलोमीटर दूर आणि समुद्रजलपातळीच्या खाली सुमारे सुमारे ३,८०० मीटर (१२,५०० फुटांवर) अटलांटिक महासागरात विसावली आहे.हिच्या या स्थानाचा शोध एका फ्रेंच-अमेरिकन मोहिमेने दि.१ सप्टेंबर,१९८५ रोजी लावला.


ओशनगेट : ओशनगेट एक्स्पीडीशन्स ही अमेरिकन व्यापारी कंपनी २००९मध्ये स्थापन झाली.या कंपनीचा धंदा होता विविध संस्था आणि कंपन्या यांना खोल पाण्यात किंवा समुद्रतळाशी संशोधन करण्यास आवश्यक असलेल्या 'सबमर्सिबल' पुरवण्याचा.सबमर्सिबलला मराठीत 'निमज्जनीय' असा शब्द आहे;पण तो अवघड वाटत असल्यास आपण सबमर्सिबल हाच शब्द वापरू

या.

सबमर्सिबल : सबमर्सिबल म्हणजे एक प्रकारची पाणबुडी.पाणबुडी आणि सबमर्सिबल यांच्यात थोडा फरक आहे.पाणबुडी ही शक्ती, पल्ला आणि तिची कामे या बाबतीत स्वयंपूर्ण असते.स्वतःच्या शक्तीच्या बळावर बंदरातून निघणे,हवे ते अंतर कापून पाण्याच्या खाली ठरावीक खोलीवर जाणे,पाण्याखाली किंवा वर हवी ती कार्य करणे आणि परत पाण्यावर येऊन बंदरात दाखल होणे या सर्व क्रिया ती करू शकते.पण सबमर्सिबल हे एव्हढे सगळे करू शकत नाही.तिची शक्ती आणि पल्ला मर्यादित असतो.जिथे पाण्याच्या खाली जाऊन शोध घ्यायचा, तेथपर्यंत सबमर्सिकलला एक जहाज घेऊन जाते.या जहाजाला 'मातृनौका' (मदरशिप) म्हटले जाते.

त्यानंतर सबमर्सिबल पाण्याखाली सोडली जाते.

पाण्याच्या खाली असलेल्या सबमर्सिबलचा तिच्या भातृनीकेशी संपर्क असतो आणि काही मदत लागल्यास ती तसे मातृनौकेला कळवते.काम झाल्यानंतर ही मातृनौका सबमर्सिबला घेऊन परत बंदरात येते. सबमर्सिबल मनुष्याद्वारे संचालित असू शकते किंवा स्वयंसंचालित असू शकते.


 टायटॅनिक पर्यटन : ओशनगेटकडे अशा तीन सबमर्सिबल होत्या.अँटिपोडस,सायक्लॉप्स - १ आणि सायक्लॉप्स- २.सायक्लॉप्स-२ चे नंतर नामकरण करून 'टायटॅन' ठेवण्यात आले. संशोधकांना घेऊन या सबमर्सिबल समुद्रतळाशी संशोधनासाठी जायच्या.

अर्थात,त्यासाठी पैसे मोजायला लागायचे.सन २०१० पासून ओशनगेटने या सबमर्सिबल पर्यटनासाठी वापरायला सुरुवात केली.सबमर्सिबलमधून प्रवाशांना समुद्राच्या पाण्याखालून विविध बेटांची आणि किनाऱ्यांची सफर घडवून आणली जात असे.असेच एक पर्यटनस्थळ म्हणून ओशनगेटने पाण्यात बुडालेल्या टायटॅनिकची निवड केली. या सफरीसाठी २०१८ मध्ये बांधल्या गेलेल्या टायटॅन सबमर्सिबलची निवड करण्यात आली. सन २०२१ आणि २०२२मध्ये या सहली पैसे देऊन येणाऱ्या 'संशोधकासाठी आयोजित करण्यात आल्या.ही सहल खूप महाग आणि फक्त अब्जाधीशांनाच परवडेल अशी होती.असे म्हटले जाते,की या सहलीमध्ये संशोधक म्हणून जाण्यासाठी माणशी अडीच लाख डॉलर म्हणजे माणशी सुमारे एक कोटी पंचाहत्तर लाख रुपये भरावे लागत होते.


टायटॅनची शेवटची सहल : शुक्रवार,दि.१६ जून २०२३ रोजी कॅनडामधील न्यूफाउंडलँडच्या सेंट जॉन्स बंदरातून पोलर प्रिन्स ही मातृनौका टायटॅन सबमर्सिबल आणि पाच प्रवासी बरोबर घेऊन टायटॅनिक सहलीसाठी बाहेर पडते. रविवार, दि. १८ जून रोजी पोटात पाच प्रवासी

घेऊन टायटॅन सबमर्सिबल पाण्यात बुडी मारते आणि तिचा टायटॅनिकच्या अवशेषांच्या दिशेने प्रवास सुरू होतो.प्रवास सुरू झाल्यानंतर सुमारे एक तास पंचेचाळीस मिनिटांनी टायटॅनचा मातृनौकेशी संपर्क खंडित होतो.

सुमारे सहा तासांच्या अवधीनंतर टायटॅन पुन्हा पाण्यावर येणे अपेक्षित होते;पण तसे काही होत नाही. त्यानंतर सुमारे दोन तासांनी कॅनडाच्या तटरक्षक दलाकडे टायटॅन सबमर्सिबल अजून न आल्याचा संदेश येतो आणि तिच्यात फक्त ९६ तास पुरेल एव्हढाच ऑक्सिजनचा साठा असल्याचे सांगण्यात येते.त्यानंतर सुरू होते ती एक आपातकालीन शोधमोहीम.कॅनडाच्या तटरक्षक

दलाबरोबरच अमेरिकेचे नौदल आणि हवाईदल, कॅनडाचे नौदल आणि हवाईदल,अमेरिकेचे तटरक्षकदल आणि फ्रान्स हे सर्व या आंतरराष्ट्रीय शोधमोहिमेत सहभागी होतात.या शोधात दूर संचालित सबमर्सिबल,पाणबुड्या शोधून काढणारी विमाने,अशी अनेक अत्याधुनिक साधने वापरात येतात.सुमारे चार दिवसांच्या शोधानंतर अमेरिकेचे तटरक्षकदल जाहीर करते, की टायटॅन सबमर्सिबल अंतःस्फोटामुळे नाश पावली आहे आणि त्यांच्या दूरसंचालित सबमर्सिबलला टायटॅनच्या शेपटाचा भाग आणि इतर काही अवशेष सापडले आहेत.

आजच्या घडीला एकशे अकरा वर्षापूर्वीची टायटॅनिक आणि आजची टायटॅन यांचे अवशेष एकमेकांपासून सुमारे ४९० मीटर (सुमारे १,६०० फूट अंतरावर समुद्रतळाशी विसावलेले आहेत आणि टायटॅनमधील पाचही जण,म्हणजे संशोधक प्रवासी,त्यांचा मार्गदर्शक आणि चालक हे मृत्युमुखी पडले आहेत.


अंत:स्फोटाची मीमांसा : टायटॅनचा अंत:स्फोट झाला असे म्हटले जाते.स्फोट आणि अंतःस्फोट या दोन्ही क्रिया क्षणार्धात घडतात.यातील फरक दाखवणारे एक सुलभ चित्र सोबत दिलेले आहे.( हे मुळ चित्र व इतर या विषयाची चित्रे आपणास प्रत्यक्ष शशिकांत धारणे,विज्ञान प्रसारक,यांनी लिहिलेल्या मराठी विज्ञान परिषद पत्रिका - सप्टेंबर २०२३ या मासिकामध्ये बघायला मिळतील. ) स्फोटामध्ये ऊर्जा,दाब,उष्णता इत्यादींचे संक्रमण आतून बाहेर होते. स्फोट हा एखाद्या आवरणाच्या आत निर्माण झालेली मोठ्या प्रमाणावरील ऊर्जा,ते आवरण सामावून न ठेवू शकल्याने होतो;परंतु अंत:स्फोट हा बाहेरील दाबाला आवरण न टिकल्याने होतो. स्फोटात प्रसरण होते,तर अंत:स्फोटात आकुंचन होते.


पाणबुडी किंवा सबमर्सिबल या पाण्याच्या आत बुडी मारून प्रवास करीत असल्यामुळे त्यांना आणि त्यातील प्रवासी आणि उपकरणे यांना सुरक्षित ठेवण्यासाठी त्यांचे योग्य प्रकारे संकल्पन,आरेखन आणि संरचना करावी लागते. जसजशी सबमर्सिबल पाण्यात खोल खोल जाऊ लागते,तसतसा त्यावरील सर्व बाजूनी पडणारा पाण्याचा दाब वाढत जातो.साधारण ठोकताळ्यानुसार (थंब रूल),सामान्य तापमानाला दर दहा मीटर खोलीला पाण्याचा दाब (प्रेशर) १ बार (सामान्य वातावरण दाब) एव्हढा वाढत जातो.परंतु जसजसे आपण समुद्रात खोल खोल जाऊ तसतसे पाण्याचे तापमान कमी होत जाते,

घनता वाढत जाते आणि त्यानुसार पाण्याचा दाबही वाढत जातो. आपल्या या लेखाच्या संदर्भात बोलायचे झाले, तर जिथे टायटॅनिक विसावली आहे.त्या खोलीवर पाण्याचा दाब वातावरणाच्या सुमारे चारशे पट म्हणजे सुमारे ४०० बार एव्हढा असतो आणि तेथील तापमान सुमारे दोन अंश सेल्सिअस एव्हढे असते.


या खोलीवर जाण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सबमर्सिबलचे या तापमानाला आणि दाबाला टिकाव धरू शकेल अशा रितीने संकल्पन आरेखन आणि संरचना आवश्यक असते. सबमर्सिबल बनविण्यासाठी योग्य असे पदार्थ वापरणे आवश्यक असते.म्हणूनच,सबमर्सिबल किंवा पाणबुडीसाठी उच्च सामर्थ्याचे (हाय स्ट्रेंग्थ) पोलाद किंवा टायटॅनिअम किंवा अल्युमिनिअम वापरले जाते.

पाणबुडी ज्या खोलीपर्यंत जाणे अपेक्षित आहे,त्या खोलीवरच्या दाबाचा विचार करून पाणबुडीचा किंवा सबमर्सिबलचा सांगाडा आणि तिच्या दंडगोलाकृती भिंतीच्या पोलादाच्या किंवा टायटॅनिअमच्या किंवा अल्युमिनिअमच्या पत्र्याची जाडी ठरविली जाते.इसवीसन १८०० पासून आधुनिक पाणबुड्या बनवल्या जात असल्याने हे धातू उच्च दाबाखाली कसे वागतात,

त्याचप्रमाणे अनेक वेळा पाण्याखाली दाब सहन करून पुन्हा पृष्ठभागावर येणे ही क्रिया केल्याने त्याचा या धातूंवर काय दीर्घकालीन परिणाम होतो,याचाही भरपूर अभ्यास आणि अनुभव आहे.उच्च सामर्थ्याचे पोलाद किंवा इतर धातू वापरून पाणबुडी किंवा सबमर्सिबल बनवणे हे काटेकोरपणे करावे लागणारे,उच्च गुणवत्तानियंत्रण आवश्यक असणारे,अतिशय अवघड,खूप वेळ लागणारे आणि खर्चिक काम असते.


टायटॅनचा अंत:स्फोट झाल्यानंतर अनेक तज्ज्ञांनी त्याची कारणमीमांसा मांडली आहे. तज्ञांना वाटणारे सर्वांत महत्वाचे कारण आहे.टायटॅनची बांधणी,टायटॅनचा पुढील आणि मागील भाग टायटॅनिअमचे दोन अर्धगोल वापरून बनवलेला होता,तर या दोन गोलांना जोडणारा मधला १४२ सेंटिमीटर व्यासाचा, १२७ मिलिमीटर जाडीचा आणि २.४ मीटर लांबीचा दंडगोलाकृती भाग हा प्रक्रिया केलेल्या कार्बन धाग्यांच्या (कार्बन फायबर) कापडाचे ४८० थर एकावर एक गुंडाळून बनवला गेला होता.याला मजबुती आणण्यासाठी त्यात परिवलयाच्या (हूप) दिशेने धागे टाकले होते. अशा प्रायोगिक प्रकारची ही पहिलीच सबमर्सिबल होती.तज्ज्ञांचे मत असे,की कार्बन धाग्यापासून बनविलेल्या गोष्टी हलक्या वजनाच्या असूनसुद्धा मजबूत असतात हे जरी मान्य केले,तरी या पदार्थाचा उच्च दाबाखाली समुद्राच्या पाण्यातील वर्तनाचा अजून पुरेसा अभ्यास झालेला नाही आणि अनुभवही नाही. याशिवाय दुसरा महत्त्वाचा आणि न अभ्यासला गेलेला मुद्दा म्हणजे 'श्रांती' (फटीग) जेव्हा एखादी गोष्ट अथवा यंत्राचा भाग सतत चक्रीय बलाला (सायकलिक लोड) सामोरा जातो,तेव्हा काही कालांतराने त्याच्या गुणधर्मांत आणि त्यामुळे सामन्यांत बदल होतो,कमतरता येते आणि तो अचानक नादुरुस्त होऊ शकतो किंवा मोडून पडू शकतो.फेल होऊ शकतो.याला श्रांती म्हणतात.


आपल्या रोजच्या जीवनातले श्रांतीचे उदाहरण घेतले म्हणने ही संकल्पना पटकन लक्षात येईल.आपण एक धातूची तार घेऊन वाकवती तर ती तुटत नाही परंतु तीच तार आपण वीस-पंचवीस वेळा वाकवली आणि सरळ केली,तर ती तुटते. तार तुटण्यासाठी हे वाकवून सरळ करण्याचे आवर्तन किती वेळा करावे लागेल,ते धातू-धातूवर अवलंबून असते.कार्बन धाग्यांचा अजूनही श्रांतीसाठी पूर्ण अभ्यास झालेला नाही.


टायटॅनिक च्या बाबतीतही असेच घडले असू शकेल,असे तज्ञांचे मत आहे.टायटॅनने याआधीही बुड्या मारून टायटॅनिक अवशेषांच्या सहली केल्या होत्या.प्रत्येक सहलीमध्ये ती समुद्रतळाशी गेली,की तिला उच्च दाब सहन करावा लागला असणार.त्यानंतर ती पुन्हा समुद्रपृष्ठावर आली.की तिच्यावर फक्त वातावरणाचा दाब असणार. म्हणजे दरवेळी ती एक बार ते चारशे बार,अशा दाबाचे आवर्तन पूर्ण करणार.या आवर्तनीय किंवा चक्रीय दाबामुळे निर्माण झालेल्या श्रांतीमुळे तिचे कवच फेल होऊन अंत:स्फोट झाला असू शकतो,असे तज्ज्ञांचे मत आहे.


या कार्बन धाग्यांपासून टायटॅनच्या संदर्भात अनेक संस्था आणि व्यक्तींनी ओशनगेटला इशारे दिले होते.सन २०१५मध्ये जेव्हा ओशनगेट 'डोअर मरीन' या कॅलिफोर्निया स्थित संस्थेकडे त्यांचा अनुभव परामर्श घेण्यासाठी गेली होती, त्या वेळी त्या कंपनीच्या अध्यक्षांनी कार्बन धाग्यांचा वापर करण्याबाबत नकारात्मक सल्ला दिला होता.त्याचप्रमाणे,मरीन टेक्नॉलॉजी सोसायटी या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या 'समानव जलांतर्गत वाहन समिती'ने टायटॅनचे प्रमाणन (सर्टिफिकेशन) करून घेण्याचाही सल्ला दिला होता.

परंतु,ओशनगेटने या कोणाच्याच सल्ल्याला भीक घातली नाही.उलट,ओशनगेटचे म्हणणे असे होते,की या सबमर्सिबलच्या धंद्यात खूपच अनावश्यक असे नियमन आहे,ज्यामुळे संशोधन, नवीन कल्पना आणि विकासाला वाव मिळत नाही.जर ओशनगेटने योग्य रितीने प्रमाणन करून घेतले असते,तर कदाचित ही दुर्घटना टळू शकली असती.

१७/९/२३

शांतपणे निरोप घेणारा भीमा.. Bhima saying goodbye quietly

१९९५ पुण्याच्या राजभवनमधून,म्हणजे औंध इथल्या राज्यपालांच्या निवासस्थानातून आमचे आयुक्त रवींद्र सुर्वे यांना एक पत्र आलं. राजभवनमध्ये ठेवलेल्या वन्य प्राणी व पक्ष्यांना आमच्या पार्कमध्ये हलवण्याचा विनंतीवजा आदेश होता.सुर्वेसाहेबांनी माझ्यासमोर ठेवलेलं ते पत्र वाचून मी हरखूनच गेलो.सहा मोर,दहा पोपट,पाच कासवं आणि तीन शेकरू आमच्याकडे येणार होती.आम्ही ताबडतोब होकार कळवला आणि नव्या पाहुण्यांच्या आगमनाची साग्रसंगीत तयारी सुरू केली.


एके दिवशी राजभवनातले सगळे प्राणी-पक्षी घेऊन वन विभागाची गाडी आमच्या पार्कमध्ये आली.दरम्यान,खूप साऱ्या ओल्या अणि सुक्या झाडांच्या फांद्या पिंजऱ्यामध्ये लावून आम्ही चार-पाच पिंजरे तयार ठेवले होते.त्यातल्या एका पिंजऱ्यात पोपट सोडले.कासवांच्या आधीच्याच पिंजऱ्यामध्ये नव्याने दाखल झालेली कासवं ठेवली.

आम्हाला सर्वांत जास्त आकर्षण होतं ते महाराष्ट्राचा राज्यप्राणी असलेल्या शेकरूंचं. विशेष म्हणजे या तीन शेकरूंमध्ये दक्षिणी राज्यांमध्ये आढळणाऱ्या शेकरूच्या एका वेगळ्या जातीची जोडी होती.दक्षिण भारतामध्ये आढळणारे हे शेकरू आकाराने लहान असतं. त्याच्या शेपटीवरचे केस काहीसे काळसर असतात.तर भीमाशंकर परिसरात आढळणारं शेकरू थोराड बांध्याचं असते.

त्याची शेपूट चांगलीच लांब असते आणि शेपटीवर पांढरट-चंदेरी केसांची लव असते.आमच्याकडे दाखल झालेला भीमाशंकरचा रहिवासी नर होता.दक्षिणी शेकरूंच्या जोडीला आम्ही एका पिंजऱ्यात ठेवलं आणि भीमाशंकरच्या नराला स्वतंत्र पिंजऱ्यात.भीमाशंकरच्या जंगलात सापडल्यामुळे वनाधिकाऱ्यांनी त्याचं नाव भीमा असं ठेवलं होतं.वनाधिकाऱ्यांना सापडला तेव्हा भीमा अगदीच बाळ होता.एका वादळी पावसाच्या रात्री सोसाट्याच्या वाऱ्यात हे बाळ आपल्या घरट्यासकट खाली पडल.पण सुदैवाने तेव्हाच एक शेतकरी आपल्या गाईंना चारून घरी चालला होता.त्याने भीमाला मायेने उचललं आणि घरी आणलं.त्याच्या बायकोने रात्रभर कापसाच्या बोळ्याने शेळीचं दूध पाजून त्याची काळजी घेतली.दुसऱ्या दिवशी एका तरुण वनाधिकाऱ्याकडे त्यांनी हे पिल्ल सोपवलं.त्या अधिकाऱ्याने भीमाला पुण्याला आणलं आणि काही दिवस घरीच सांभाळलं.पण थोड्याच दिवसांत त्याची बदली पुण्याबाहेर झाली. त्यामुळे त्याने भीमाला पुण्याच्या राजभवनमध्ये ठेवलं.

गव्हर्नर मॅडमचा भीमा खूपच लाडका होता.त्या पुण्यात असल्या की स्वतःच्या हाताने त्याला सुकामेवा खायला घालत असत.असा प्रवास करत करत आता भीमा आमच्याकडे दाखल झाला होता.जिथे जाईल तिथे लळा लावी.आमच्याकडे आल्यावरही थोड्याच दिवसांत भीमाने सगळ्यांची मनं जिंकली.फक्त पार्कवरच्या आम्हा लोकांचाच नव्हे,तर साऱ्या पिंपरी-चिंचवड शहराचा तो लाडका हीरो झाला.आयुक्त-महापौरांकडे येणारे पै-पाहुणे भीमाला बघायला हमखास पार्कवर येऊ लागले.अंगावर तांबू चकचकीत कोट, झुपकेदार शेपटी,छोटुकले कान आणि नटखट डोळे असा झकास रुबाब होता.त्याचा

त्याच्या पिंजऱ्यामध्ये आम्ही वेगवेगळ्या पातळीवर फांद्या बांधल्या होत्या.त्यांच्यावरून त्याला उड्या मारताना पाहून प्रेक्षक हरखून जात.त्याच्या विश्रांतीसाठी आम्ही एक घरटंही तयार केलं होतं.दुपारी आणि रात्री टुणकन उडी मारून तो त्या घरट्यात जाऊन झोपत असे.


भीमा आमच्याकडून हक्काने खायचे-प्यायचे लाडही करून घेत असे.लहानपणापासून माणसांसोबत वाढल्यामुळे असेल,पण त्याला एकटं जेवायला आवडायचं नाही.त्याच्या पिंजऱ्यातल्या ताटलीत कीपरने त्याचं अन्न ठेवून दिलं तर तो त्याकडे ढुंकूनही बघायचा नाही,पण कोणी तरी ओळखीचा माणूस जवळपास असेल तरच तो अन्नाला तोंड लावायचा.सूर्योदय झाला की स्वारी घरट्याबाहेर डोकवायची.मी हातात फळं घेऊन त्याच्या पिंजऱ्याकडे निघालो की टॉक-टॉक टॉक-टॉक आवाज सुरू व्हायचा. पिंजऱ्यात शिरण्याचा अवकाश,

भीमा थेट माझ्या खांद्यावर उडी घ्यायचा.माझ्या हातातून खाणं घेऊन खांद्यावर बसूनच तो खात असे. प्रतिभाचाही तो चांगला दोस्त झाला.तिच्या खांद्यावर बसून आवडते पदार्थ मटकावायचा.आवडत्या लोकांकडून जेवण मिळालं की स्वारी खूपच खूष असायची.


माणसांची त्याला खरोखरच आवड होती.नवख्या माणसासोबतही त्याचं छान जुळायच. एकदा प्रसिद्ध जीवशास्त्रज्ञ डॉ.रेनी बोर्जेस आमच्या पार्कवर आल्या होत्या.भीमाशंकर परिसरातील शेकरूंचा त्यांचा दांडगा अभ्यास होता.त्यांच्याही खांद्यावर भीमा मनसोक्त बागडला.आयुक्त रवींद्र सुर्वे निवृत्त होऊन त्यांच्या जागी रुजू झालेल्या प्रवीणसिंह परदेशींनाही भीमाचा खूप लळा लागला होता. त्यामुळे पिंपरी-चिंचवडमध्ये झालेल्या 'राज्य मिनी ऑलिंपिक स्पर्धे'चा स्पर्धेचा शुभंकर होण्याचा मान भीमाला मिळाला.टी. रमेश नावाच्या बॉक्सरने तर या खेळांच्या उद्घाटनावेळी शेकरूच्या अंगासारखा पोशाख 'भीमा.. भीमा..' च्या तालावर नृत्य केलं. स्पर्धा सुरू असताना शहरभर भीमाची वेगवेगळे खेळ खेळतानाची मोठमोठाली कॅरिकेचर्स लागली होती.त्यामुळे इतर प्रेक्षकांबरोबरच या स्पर्धेसाठी जमलेले खेळाडूही आवर्जून आमच्या पार्कमध्ये येऊन भीमाला भेटून जात होते.भीमा सेलिब्रिटी होताना पाहण हा आमच्यासाठी मजेशीर अनुभव होता. 


भीमाचं आणि प्रसिद्धीचं काही तरी नातं असावं. एकदा सूर्यग्रहण होतं.वेल्डिंग करण्याच्या काचेतून आम्ही आळीपाळीने सूर्यग्रहण पाहत होतो.सूर्यग्रहणाचा प्राण्यांच्या वर्तनावर काही परिणाम होतो का हे बघायला एक प्रेस फोटोग्राफरही आला होता.काचेतून आम्ही आकाशात नक्की काय पाहतोय याची उत्सुकता भीमाच्या चेहऱ्यावर दिसत होती.गंमत म्हणून आम्ही त्याच्या डोळ्यांसमोर काच धरली.त्यानेही त्या काचेतून सूर्यग्रहण बघितलं.त्या फोटोग्राफरने तो क्षण अचूक आपल्या कॅमेऱ्यात टिपला आणि दुसऱ्या दिवशीच्या पेपरमध्ये छापूनही टाकला. पुन्हा एकदा आमचा भीमा हीरो झाला.


भीमाची आणखी एक आठवण मनात अगदी घट्ट रुतून बसली आहे.त्या वर्षी असह्य उन्हाळा होता.मे महिन्याचे सुरुवातीचे दिवस होते. बसल्याजागी घाम येऊन कपडे चिंब भिजायचे. अंगाची तलखी तलखी व्हायची.एके दिवशी तर कहर झाला.तापमान ४७ अंशांच्याही वर पोहोचलं असेल.(सोयरे वनचरे,अनिल खैर,समकालीन प्रकाशन) आम्ही आणि आमचे प्राणी-पक्षी सगळेच चिडीचूप बसून होतो.पिंजऱ्यांचे पत्रे कडक उन्हाने तापून प्राण्यांची तलखी वाढवत होते.एवढ्या रणरणत्या उन्हात प्रेक्षक तरी कशाला येताहेत! अगदीच एखाद-दुसरा चुकार माणूस पार्कमध्ये फिरत होता.दुपारी दीड-दोनच्या सुमारास मी एकटाच पार्कच्या राऊंडला निघालो.सर्वच प्राणी-पक्षी मलूल झाले होते.माणसांचीच वाट लागली होती,तर बिचाऱ्या त्या मुक्या जीवांना किती त्रास होत असेल ! चक्कर मारत मारत भीमाच्या पिंजऱ्याजवळ आलो,तर तो कुठेच दिसेना.त्याच्या नेहमीच्या जागेवर तो नव्हता,की घरट्यातही.खाली पाहिलं तर पिंजऱ्यातल्या पाचोळ्यामध्ये भीमा आडवा झाला होता.मी घाबरून त्याच्याजवळ गेलो. मोठ्याने हाक मारल्यावर तो थोडासा हलला; पण उठून बसण्याएवढी हुशारी त्याला वाटत नव्हती.मी हाका मारल्या,तसे आसपासचे कर्मचारी लगोलग धावून आले.भीमाची अवस्था पाहून त्यांनी शेजारच्या तळ्यातलं पाणी पिंजऱ्यावर मारायला सुरुवात केली;पण त्याने काही फरक पडेना म्हटल्यावर आम्ही फायर ब्रिगेडचा बंब बोलावला.तेही ताबडतोब आले आणि होज पाइपने त्यांनी अख्ख्या पक्षालयावर पाणी मारायला घेतलं.पिंजऱ्यावर जणू पाऊसच सुरू झाला.

सारेच प्राणी-पक्षी सुखावले.तापलेले पिंजरे गार होऊ लागले,तसा भीमाही सावध झाला.थोड्याच वेळात त्याला हुशारी आली. पावसात तो उड्या मारत भिजला आणि आनंदी होऊन पिंजराभर नाचू लागला.आम्हाला सर्वांना हायसं वाटलं.पुढचे दोन-तीन दिवस आगीचा बंब पाणी बरसून जात होता.त्यानंतर मात्र तापमान बऱ्यापैकी खाली उतरलं आणि आमच्या जीवात जीव आला.


भीमा आमच्यासोबत १२ वर्षं होता.त्यानंतर मात्र हळूहळू त्याची दृष्टी कमी होत गेली.हालचाली मंदावल्या.आम्ही त्याच्यावर उपचार सुरू केले.सुरुवातीला त्याचा उपयोग झाला,पण नंतर त्याचं शरीर उपचारांना प्रतिसाद देईना.

आपल्या एक्झिटची वेळ जवळ आल्याचं त्याला समजलं असावं.एके दिवशी त्याने खाणं सोडलं.दुसऱ्या दिवशी मध्यरात्री कधी तरी शांतपणे तो आम्हाला सोडून निघून गेला.आजही त्याची आठवण निघाली की त्याच्या डोळ्यांतले मिश्कील भाव आठवून चेहऱ्यावर हसू उमटतं. 

१५/९/२३

रोम : पाश्चिमात्य वैद्यक - २ Rome : Western Medicine

नवनव्या प्रसंगांना सामोरं जात असताना गेलनला अनेक गोष्टी शिकायला मिळत.ते सगळे उपचार करताना तो शारीरिक आणि मानसिक विकारांवर उपचारपद्धती विकसित करत असे. त्यासाठी तो विविध प्रकारच्या वनस्पती आणि खनिजं यांच्यापासून औषधं बनवून पाही. त्यामधून मिळणाऱ्या निष्कर्षांच्या आधारे तो आपल्या उपचारपद्धती आणखी सुधारणा करे. त्यानं औषधं तयार करणं आणि ती रुग्णांना घेण्याविषयीच्या सूचना देणं (म्हणजेच फार्मसी) याविषयी अनेक पुस्तकं लिहिली!ग्रीकांना एकूणच विज्ञानाची आवड होती.आपण ज्या जगात राहतो त्या जगाविषयी सगळं समजून घेण्यासाठी आधी आपल्या परिसराची शास्त्रीय दृष्टिकोनातून ओळख करून घेतली पाहिजे असं त्यांना वाटे.याच धर्तीवर गेलनला वैद्यकशास्त्र हे विज्ञान मानलं जावं असं वाटे. त्यादृष्टीनं त्याची प्रचंड धडपड सुरू असे.प्रयोगांमधून मिळणारी माहिती आणि त्याला दिलेली आपल्या स्वतःच्या निरीक्षणांची जोड या दोन गोष्टींची सांगड घालून आपला हेतू साध्य होईल अशी त्याला खात्री वाटे.तसंच अंधश्रद्धा आणि खरं ज्ञान यांच्यातला धूसर फरक एकदम स्पष्ट करून त्या पूर्णपणे वेगळ्या झाल्या पाहिजेत यासाठी तो प्रयत्नशील असे.त्यानं यासाठी आपल्या हयातीत ३०० च्या वर पुस्तकं आणि लेख लिहिले.


दुसऱ्या शतकात,चार रोमन राज्यांच्या दरबारी वैद्य म्हणून सेवा करताना जखमांवर उपचार करण्यासाठी गेलन अनेक प्रकारची हत्यारं वापरे त्यात विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया करण्यासाठी वेगवेगळ्या आकारांच्या सुऱ्या होत्या.त्यातली एक सुरी माणसाच्या शरीरातून रक्त वाहून जाण्यासाठी वापरली जाई.त्यामुळे माणसाच्या शरीरात साठून राहिलेलं विष निघून जातं असा समज होता.गळू फोडून त्यातून पू वाहून जाण्यासाठी एक वेगळ्या प्रकारची सुरी होती.गरम करून शरीरावर झालेल्या जखमेतल्या किंवा इतर कारणांमुळे झालेल्या संसर्गाला हलकेच जाळून टाकण्यासाठी आणखी एक वेगळ्या प्रकारची सुरी होती.शरीरातल्या हाडात अडकलेला शस्त्राचा भाग काढून टाकण्यासाठी अजूनच एक वेगळ्या प्रकारची सुरी होती.वाकडं झालेलं हाड सरळ करण्यासाठी चौकोनी पात्याची स्टीलपासून बनलेली एक बोथट सुरी होती.त्या काळातली ही प्रगत हत्यारं पाहिली की फारच आश्चर्य वाटतं.


आपला चार वर्षांचा करार १६१ साली संपल्यावर वयाच्या ३१ व्या वर्षी गेलननं दुसरं काहीतरी करायचं असं ठरवलं.कारण आता त्याच्या कामात तोचतोचपणा यायला सुरुवात झाली होती.पुन्हा जन्मगावी परतण्याऐवजी त्यानं आता इटलीचा प्रवास करून रोममध्ये जायचं ठरवलं.

प्रत्यक्षात त्याला रोमला पोहोचायला एक वर्षांहून जास्त वेळ लागला.तिथे पोहोचताच त्यानं युडेमस नावाच्या त्याच्या वडिलांच्या मित्राची भेट घेतली.पण ते आजारी असल्यानं त्यांनी गेलनला त्यांच्या दुसऱ्या मित्रांना भेटायला जायचा सल्ला दिला.गंमत म्हणजे अगदी सुरुवातीच्या काळात रोमन लोकांना डॉक्टर म्हणजे अगदी कुचकामी लोक वाटायचे.घरात कुणी आजारी पडलं तर त्याला कुटुंबातल्याच कुणीतरी औषधी वनस्पती आणि जादूटोणा यांच्यासारखे उपचार करून बरं करावं अशी त्यांची इच्छा असे.त्यामुळे ग्रीसमधून पकडून आणलेले गुलाम हेच फक्त डॉक्टर्स बनायची नामुष्की पत्करायचे.त्यांना क्वॅक्स (म्हणजे एकदम फालतू) असं म्हटलं जाई. म्हणूनच हे नाव तोतया किंवा जुजबी डॉक्टर्ससाठी अजूनही वापरतात!


या पार्श्वभूमीवर इतक्या सगळ्या डॉक्टर्सच्या गर्दीत आपला निभाव कसा लागणार अशी भीती गेलनला वाटत होती.पण त्याची एक मजाच आहे.आधी उल्लेख केलेले युडेमस हे त्याच्या वडिलांचे मित्र आजारी असताना रोममधल्या डॉक्टर्सनी त्यांच्यावर केलेले उपचार कुचकामी ठरत होते.त्यामुळे त्यांनी बघूयात तरी म्हणून गेलनला त्यांच्यावर उपचार करण्यासाठी बोलावलं.

गेलननं त्यांच्या आजाराचा नीट अभ्यास करून त्याच्यावर उपाय सुचवला.तो मात्र त्यांना एकदम लागू पडला आणि त्यांची तब्येत बऱ्यापैकी सुधारली.ही बातमी रोममधल्या प्रतिष्ठित आणि श्रीमंत लोकांपर्यंत पोहोचताच त्यांची गेलनकडे रांग लागली.रोममधल्या एका सरकारी दूतावासात काम करणाऱ्या फ्लॅवियस बोईथियस नावाच्या अधिकाऱ्याच्या बायकोला गेलननं याच धर्तीवर बरं करताच खूश होऊन त्यानं गेलनला ४०० सुवर्णमुद्रांचं बक्षीस तर दिलंच,पण त्याचबरोबर आपल्या उपचारपद्धतींविषयी गेलननं व्याख्यानं द्यावीत अशी त्याला विनंती केली. गेलननं ती मान्य करताच बोईथियसनं त्याच्यासाठीची सगळी व्यवस्था केली.तसंच प्राण्यांच्या शरीरविच्छेदनाचं प्रात्यक्षिक सगळ्यांना बघायला मिळावं यासाठी त्यानं एक मोठं टेबल आणि सगळ्या अवजारांची सोयही केली.गेलनची व्याख्यानं आणि त्याची शरीरविच्छेदनाची प्रात्यक्षिकं या दोन्ही गोष्टी लवकरच रोममधल्या सुशिक्षित लोकांमध्ये करमणुकी

बरोबरच ज्ञान देणाऱ्या ठरल्या आणि 'टॉक ऑफ दी टाऊन' झाल्या.


एकदा त्यानं सगळ्या सजीवांच्या बोलण्याचा उगम हा हृदयातून नव्हे तर मेंदूतून होत असतो, हे सिद्ध करायचं ठरवलं.त्यासाठी त्यानं एका जिवंत डुकराला आपल्या शरीरविच्छेदनाच्या टेबलावर त्याचे पाय वर करून बांधून टाकलं. लगेच ते डुकर जिवाच्या आकांतानं ओरडायला लागलं.मग एका दोरीच्या साहाय्यानं गेलननं त्याच्या घशातून तोंडाकडे आवाज नेणाऱ्या वाहिन्यासुद्धा एका दोरीनं हलकेच बांधताच डुकराचा आक्रोश बंद झाला आणि ती दोरी सोडताच तो पुन्हा सुरू झाला.अशा तऱ्हेनं गेलन आता अनेक गोष्टी सप्रयोग सिद्ध करून दाखवू लागला! त्या काळातला दुसरा एक समज म्हणजे सजीवांच्या शरीरातलं रक्त एकीकडून दुसरीकडे नेण्याचं काम फक्त एकाच प्रकारच्या रक्तवाहिन्या (नीला / शिरा) च करतात,असा होता.तसंच प्राणी जिवंत राहण्यासाठी हृदयाकडून सगळ्या अवयवांकडे व्हायटल स्पिरीट नावाचा पदार्थ रोहिण्या (धमन्या) या दुसऱ्या प्रकारच्या रक्तवाहिन्या सतत नेण्याचं काम करतात,असं लोक मानत.पण गेलनचं म्हणणं होतं, की नीला आणि रोहिण्या या दोन्ही प्रकारच्या रक्तवाहिन्या रक्त नेण्याचं काम करतात. फक्त नीला शरीरातल्या अवयवांकडून अशुद्ध रक्त हृदयाकडे नेतात आणि रोहिण्या शुद्ध रक्त हृदयाकडून इतर सगळ्या अवयवांकडे नेतात,एवढाच काय तो फरक असतो. हे सिद्ध करण्यासाठी त्यानं एका प्राण्याला त्याच्या आपल्या शरीरविच्छेदनाच्या टेबलावर बांधून ठेवलं.मग त्याच्या रोहिणीला त्यानं मध्ये थोडं अंतर सोडून दोरीनं गच्च बांधून टाकलं.त्यामुळे तिच्यामधून शरीरात प्रवास करणारं रक्त एखाद्या पाण्याच्या कालव्यात दगडाचा बांध घातल्यावर जसं पाणी अडून बसतं तसं पुढे जाणं बंद झालं. मग ज्या दोन ठिकाणी त्यानं त्या प्राण्याच्या शरीरातल्या रोहिणीला गच्च बांधलेलं होतं, त्यांच्यामध्येच त्यानं सुरीनं ती रोहिणी कापून टाकली.

लगेच तिथून आधी साठलेलं रक्त भळाभळा वाहू लागलं.

म्हणजेच रोहिणीमधून रक्त जातं हा त्याचा दावा खरा होता.याच धर्तीवर त्यानं आपल्या पाठीच्या मणक्या

विषयीसुद्धा एक महत्त्वाचं प्रात्यक्षिक दाखवलं.त्यातून सिद्ध झालं की आपल्या पाठीच्या मणक्याला जर जोरदार इजा झाली तर जिथे इजा झाली असेल त्याच्या खालचा भाग लुळा पडतो,पण जर ही इजा चौथ्या किंवा त्याच्या वरच्या मणक्यावर झाली तर मात्र आपण लगेच मरतो.

अर्थात,या प्रात्यक्षिकासाठी त्याला माणसाच्या ऐवजी कोणता तरी प्राणी वापरणं भाग होतं.कुत्र्यांच्या मूत्रपिंडाचं आणि मूत्राशयाचं प्रात्यक्षिकही त्यानं दाखवलं आणि त्याचं कार्य समजावून सांगितलं. पण त्याच धर्तीवर माणसाच्या मूत्रपिंडाचं आणि मूत्राशयाचं काम चालतं हा त्याचा दावा साफ खोटा ठरला होता.!


गेलनच्या व्याख्यानांना प्रचंड गर्दी व्हायची.त्याची बोलायची शैली आणि ओघवती भाषा सर्वसामान्यांना समजेल अशी असे.त्यामुळे क्लिष्ट विषय आणि मुद्देही तो लोकांना कंटाळा येऊ न देता समजावून सांगू शके.आपले मुद्दे तो अतिशय आत्मविश्वासानं मांडायचा.हे करत असताना तो इतर डॉक्टरांची त्यांच्या हावरटपणामुळे किंवा अज्ञानामुळे झालेल्या हास्यास्पद वृत्तीची खिल्ली उडवायचा.अनेकदा तो त्यांची नक्कल करायलाही कचरत नसे! अनेक डॉक्टर्स त्यांच्या कौशल्यापेक्षा त्यांच्या श्रीमंतीसाठीच जास्त प्रसिद्ध आहेत असं तो जाहीरपणे म्हणे.साहजिकच अनेक डॉक्टर्स त्याच्याविरुद्ध भडकायचे.अनेकदा गेलन आणि त्यांच्यामध्ये जाहीरपणे वादावादी व्हायची. त्यातून गेलनचं नवनव्या माणसांशी शत्रुत्वही वाढायचं.कधीकधी गेलन आपल्या वक्तव्यांविषयी सरळ माफी मागून मोकळा व्हायचा आणि म्हणायचा,'मला माफ करा... मी असं पुन्हा कधी करणार नाही' आणि अर्थातच तो लगेच पुन्हा तसं करायचा! हे सगळं करत असतानाच तो पुस्तकं,लेख आणि डॉक्टरांसाठी मार्गदर्शनपर पुस्तिकाही लिहायचा. मुख्य म्हणजे अनेक रुग्णांवर उपचार करणं हे त्याचं सगळ्यात महत्त्वाचं आणि पहिल काम सुरूच होतं.त्या काळच्या रोमच्या सम्राटाच्या दरबारातला तो सगळ्यात मोठा डॉक्टर बनला. तसंच त्याची इतर रोग्यांना तपासायची फी जास्त असे.साधं पत्रानं कुणाला वैद्यकीय सल्ला द्यायचा तरीही तो त्यासाठी फी आकारे.अतिशय बाळबोध उपचारपद्धती आणि रोगनिदान यंत्रणा असूनही गेलन कावीळ,जुलाब,कुष्ठरोग अशा अनेक रोगांचं निदान नुसत्या निरीक्षणातून करू शके.तसंच काही जणांना काहीही झालेलं नसताना आपण आजारी आहोत असं उगीचच वाटे.(आजही असे खूप जण असतात!) त्यांना तो उगीच कसल्या तरी निर्धोक औषधांचा उपचार सुचवे.

त्यामुळे आपण कसलं तरी औषध घेऊन बरं होतोय असं खरं तर बरंच असलेल्या माणसाला वाटे आजही हे सुरूच असतं,फक्त त्याला तांत्रिक भाषेत 'प्लासेबो उपचारपद्धती' म्हणतात,इतकाच काय तो फरक !


काही काळानं गेलननं अचानकच रोम सोडायचं ठरवलं.त्याचं कारण त्यानं इतर डॉक्टरांचा कोता स्वभाव आणि त्यांच्याशी सतत होणारी भांडणं असं दिलेलं असलं तरी ते खरं नसावं.रोमची सत्ता मार्क्स ऑरेलियस आणि ल्युशियस व्हेरस यांच्या हाती आल्यापासून रोम सतत युद्धात गुंतलेलं होतं.या युद्धातून परतणाऱ्या सैनिकांनी त्यांच्याबरोबर प्लेगची साथ आणली. डॉक्टर असूनही गेलनला प्लेगची भयंकर भीती वाटे कुठल्याच डॉक्टरला त्या काळी हा रोग कुठून येतो आणि कशामुळे होतो हेच माहीत नसल्यामुळे तो बरा कसा करायचा हा प्रश्नच पडत नव्हता.या प्लेगनं एकूण लोकसंख्येच्या एकतृतीयांश जनतेला संपवून टाकलं! बहुतेक यामुळेच तातडीनं गेलननं त्याचं सगळं सामानसुमान विकून टाकलं आणि तो आपला गाशा गुंडाळून पेरॉममला परत गेला.तिथे तो इसवी सन १६८ सालापर्यंत होता.मग रोममध्ये युद्ध सुरू होतं,त्यामुळे रोमच्या राजानं गेलनला पुन्हा वैद्यकीय सेवेवर यायचं आमंत्रण दिलं.तिथे थोडे दिवस काम केल्यावर त्याला त्याचा कंटाळा आला.मग त्यानं मार्क्स ऑरेलियस या राजाला आपल्याला पर्गेमॉनला परतू द्यायची विनंती केली.तिथे राजाच्या कॉमोडस नावाच्या मुलाची काळजी घ्यायचं काम करायचं त्यानं कबूल केलं. पण ते जरा अवघडच होतं.कारण कॉमोडस जरा वेडसरच होता.गेलन रोमला परतल्यावर इकडे युद्धात रोमचे दोन्ही राजे दगावले.त्यांच्या पश्चात कॉमोडस राजा बनला.त्याची काम करायची पद्धत भयानक असल्यामुळे तो अतिशय वाईट राज्यकर्ता होता.पण तरीही गेलन त्याची मनोभावे सेवा करत होता.१९२ साली कॉमोडसची एका कटात हत्या झाली,आणि त्याची जागा सेप्टिमस सेव्हेरस नावाच्या नव्या राजानं घेतली.आता गेलन त्याचा राजवैद्य बनला.


त्याच वर्षी रोममधल्या शांती मंदिराला आग लागली आणि त्यात गेलननं तिथे ठेवलेली अनेक हस्तलिखितं आणि टिपणं नष्ट झाली. आपल्या आयुष्याची शेवटची दोन दशकं गॅलेननं रोममध्येच काढली.तिथे त्यानं बहुतेक सगळा वेळ लिखाणात घालवला.त्याच्या काही पुस्तकांची नावं तरी बघा : 'बोन्स फॉर बिगिनर्स', 'ऑन द युजफूलनेस ऑफ पार्ट्स ऑफ द बॉडी.' एकदा तर म्हणे गेलन एका वेळी बाराजणांना त्याच्या १२ वेगवेगळ्या पुस्तकांचा मजकूर डिक्टेट करत होता आणि ते १२ जण त्याची १२ पुस्तकं एकाच वेळी लिहीत होते! एकूण वैद्यकशास्त्रात गेलनचं नाव अजरामर झालं हे निश्चित !


१३.०९.२०२३ या लेखातील भाग २ रा समाप्त..