* विजय गायकवाड | Vijay Gaikawad

live

नमस्कार आपले स्वागत आहे. मी पुस्तके आणि मित्रांवर पैसे खर्च करतो,माझ्याकडे दगड आणि विटांवर खर्च करण्यासाठी पैसे नाहीत.-रस्किन बाँड. ही थोर माणसं व त्यांचे विचार मला पुस्तकात भेटलीत.ती भेटली आणि त्यांनी सांगितले कि,प्रत्येक दिवशी असं काही तरी करा की,ते तुम्हाला अधिक सुंदर उद्याच्या दिशेने खूप लांबवर घेऊन जाईल."- डोग फायरबाऊ.'तुम्हाला जर संधी मिळाली तर तुम्ही तुमची मुलं जाळून टाकाल,की तुमची पुस्तकं ?' असा विचित्र प्रश्न स्किनरनं त्याच्या पहिल्याच टेलिव्हिजनच्या कार्यक्रमात प्रेक्षकांना थेटपणे विचारला होता आणि इतकंच नाही,तर 'मी तर मुलांनाच जाळेन,कारण मानवी प्रगतीमध्ये माझ्या पुस्तकांमुळे माझ्या जीन्सपेक्षा जास्त योगदान मिळेल,'असंही त्या प्रश्नांचं स्वत:च सरळपणे उत्तरही दिलं होतं! सर्वियन कादंबरीकार मिलोराद पावीच यांचे एक वाक्य आहे ते म्हणतात - जोवर जगात पुस्तक वाचणाऱ्या वाचकांची संख्या बंदूकधारी सैनिका पेक्षा अधिक आहे तोवर काळजीच काहीच कारण नाही.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात.पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये.म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे मार्गदर्शक, सहकारी धावून येतात.प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,डॉ.दीपक शेटे,आ.भरत बुटाले,प्रा.सर्जेराव राऊत,सुभाष ढगे,अनिल फारणे,डॉ.सुधीर सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,जज्ज,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, पुस्तकातील घटना प्रसंग सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर' पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी पुस्तके, लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत.... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ.मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. - मॅट्रिक फेल विजय गायकवाड

२९/१०/२३

असे ही एक स्मारक - Such a memorial..

ते काॕटवर बसलेले बाबा दिसतात का ?अं..हो तेच ! 


आपण त्यांना पाहु शकतो पण ते आपल्याला नाही पाहु शकत... कारण त्यांना दिसतच नाही... ! 


अं...हं... पण त्यांना अंध म्हणायचं धाडस नाही होत.नजर नसेलही डोळ्यात कदाचीत,पण तरीही त्यांना एक दृष्टी आहे... !


नजर आणि दृष्टी मध्ये फरक आहे... दोन वाक्यं वाचायला नजर लागते.. त्याचा अर्थ कळायला दृष्टी !


समोरच्याला पहायला नजर लागते... समोरच्याच्या मनातलं पहायला दृष्टी ! 


लहानपणी शाळेत प्रत्येकजण चौकोन,त्रिकोण, काटकोन,

लघुकोन,विशालकोन शिकतो... दृष्टिकोन शिकायचा राहुनच जातो !


आयुष्याच्या भुमितीत,आपणच आपल्याभोवती एक न दिसणारं वर्तुळ आखुन घेतो,आपल्याही नकळत ... 


यात एक चौकोनी कुटुंब असतं... 


मी,माझं आणि मला या 'त्रि' कोनांच्या बाहेरचं जगच नाही असं समजुन जगणं सुरु होतं....


संकुचित कसं व्हायचं असतं ते लघुकोनानं शिकवलेलंच असतं... 


विशालकोन सुद्धा आस्तित्वात असतो...हे कळेपर्यंत आयुष्याचा काटकोन झालेला असतो... 


आपणही एकदा विशालकोन होवु म्हणता म्हणता... समिकरणं बदलत जातात... हिशोब मांडता मांडता सगळेच कोन मोडुन पडतात आणि मग उरते फक्त सरळ रेषा...


आपले सगळेच कोन हरवुन बसतात... आणि शेवटी प्रश्न उरतो आता मी कोण ? 


या प्रश्नाचं उत्तर सापडेपर्यंत... आयुष्याची भुमिती कळण्याआधीच... या सरळ रेषेला भुई मातीत घेते कायमचीच...!


असो ! 


नीट पाहिलं ? या बाबांना पायही नाहीत...! 


हे अंध आणि अपंगही... ! 


पण यांना डोळे नसुनही दृष्टी आहे आणि पाय नसुनही उठुन उभं राहण्याचं बळ अजुन आहे..! 


अंध असुनही दृष्टी असणं आणि पाय नसुनही बळ असणं यालाच दिव्य अंगं म्हणतात...! 


ज्यांच्याकडे हि अंगं आहेत ते दिव्यांग !

शहाणपण आणि अनुभवही असेच... !


शहाणपणाला पाय असतात,ते चालु शकतं,पण डोळे नसतात...! अनुभवाला दिसु शकतं,डोळे असतात पण पाय नसतात...ते स्वतंत्र चालु शकत नाही ! 


एकटं शहाणपण आणि एकटा अनुभव असुन काहीच कामाचे नाहीत !


अशावेळी शहाणपणानं,अनुभवाला पाठकुळीवर घ्यावं... अनुभव दाखवेल त्या दिशेनं शहाणपणानं मग चालत रहावं... ! 


असं चालणं म्हणजेच जगणं... नाहीतर फक्त भोगणं ...! 


तर... बाबांचे लहानपणीच डोळे गेले... पण पाय मात्र धडधाकट होते. 


रेल्वेमध्ये काही न् काही विकायचा व्यवसाय ते करायचे.

ऊत्तम चाललं होतं.पुढे लग्न झालं.दोघं एकमेकांना पुरक ! 


एक मुलगी झाली... त्यानंतर मुलगा...! 


यथावकाश मुलीचं लग्न करुन दिलं.मुलगा लहान होता,त्याला शिकायची भारी हौस... ! म्हणायचा,पप्पा खुप शिकायचंय मला... ! पप्पाही त्याच्या डोक्यावरुन हात फिरवत सांगायचे... बाळा भरपुर शीक,मोठा हो ! 


मी वचन देतो तुला,शिक्षणासाठी काही कमी पडु देणार नाही... ! पण... हे घडायचं नव्हतं...


एके दिवशी रेल्वेतुन गडबडीने उतरतांना पाय घसरला, पायांवरुन रेल्वे गेली... थोड्यावेळापुर्वी असणारे पाय सोडुन गेले... !


पुर्ण अपंग होवुन घरात झोपुन राहिले.पायातली वेदना आणि डोक्यातले विचार... दोन्हींच्या कळा मस्तकात जायच्या ! खायचे प्यायचे वांधे... आता मुलाला शिकवणार कसं ? 


परिस्थिती मार्ग दाखवते.... 


बाबांच्या पत्नीनं आता चार घरी घरकाम सुरु केलं... कसंतरी घर पुन्हा चालु लागलं ...


बाबांची पत्नी बाबांचं सारं करायची ! 

पण हे सुद्धा व्हायचं नव्हतं ! 


मध्यंतरी बाबांच्या पत्नीच्या पायाला काहीतरी झालं,

पायाला गँग्रीन झालं... निदान होवुन ऊपचार सुरु होईतो... डाॕक्टरांनी जाहिर केलं,यांचेही पाय कापावे लागतील नाहीतर जगण्याची शाश्वती नाही... ! 


बाबांच्या पत्नीचाही पाय कापावा लागला... !


आता कुणी कुणाचं करायचं ?  दोघेही अंथरूणावर पडुन...!


मुलगा रात्र रात्र रडत रहायचा... ! तिघांच्याही डोळ्यांपुढं पुर्ण अंधार... ! कुणीतरी जाणुनबुजुन हे घडवुन आणलंय असं वाटावं अशी परिस्थिती !


लोक भेटायला - बघायला यायचे... पोकळ सांत्वन करुन निघुन जायचे... 


दिवसा भरलेलं घर... रात्री रिकामं व्हायचं आणि मागे उरायचे तीन जीव...अंधारात तळमळणारे.!


ताजमहालाचंही असंच ...! 


दिवसा बघायला,कौतुक करायला आख्खी दुनिया लुटते... पण रात्रीच्या अंधारात सोबतीला कुणी थांबत नाही इथं ... ! नदीच्या काठावर थंडीनं कुडकुडत,आयुष्याच्या अंधारात तोही तळमळत असतो एकटा ... जीवाची लाही लाही होत असते एकटेपणामुळे...! त्याची घुसमट होत असते... घुमटाच्या आत... आणि लोक याच घुमटाकडं पाहुन म्हणतात... वाह ताज !!!


सौंदर्यालाही शाप असतो हेच खरं....! 


बाबांच्याही सुंदर आयुष्याला असंच गालबोट लागलं होतं.बाबांच्या डोळ्यापुढं होतं... पोराचं आयुष्य...त्याचं शिक्षण,आणि शिकवण्याचं त्याला दिलेलं वचन !


नविन झालेली जखम,जुन्या जखमांच्या वेदना कमी करते,हेच खरं !


पत्नीचं दुःख्खं पाहुन ते स्वतःचं दुःख्खं विसरले...! 

पुन्हा काम करायचं ठरवलं त्यांनी...


घरातल्या पाटाला चाकं जोडली आणि त्यावर बसुन हातानं ढकलत ते इकडुन तिकडे फिरायला शिकले. 


लोक पायात मोजे घालुन त्यावर बुट घालतात... बाबा हातात बुट घालतात... ! 


पाटावर बसुन रस्त्यांवर हात घासत जातांना हाताला इजा होवु नये म्हणुन...


पायाचं काम,आता हात करायला लागले... ! 


परिस्थितीनुसार,जो स्वतःला बदलतो तोच टिकतो या जगात ! 


जग सुंदरच आहे... हातांनीही कधीतरी पायाशी येण्याचं मोठेपण दाखवलं तरच... ! 


पाटावर बसुन,दारोदारी जावुन काम शोधणं सुरु झालं...! 


दारावर आलेला हा भिकारीच आहे असं समजुन,लोक पाच दहा पैसे अंगावर फेकत... काम नाही !


पाचदहा पैशांत लोकांना पुण्य विकत हवं असतं... !


मेलेल्या माणसाला खांदा देवुन पुण्य मिळवण्यापेक्षा,

जमिनीवर पडलेल्याला हात देवुन उठवण्याने पुण्य जास्त मिळतं... ! 


हात द्यायचा कि खांदा ... ज्याने त्याने ठरवावं...! 


आता,सकाळी काम शोधायला निघायचं आणि संध्याकाळी परत यायचं, हे रोजचंच झालं...! 


एके दिवशी भकास आयुष्यं घेवुन,रस्त्यावर ते विचार करत बसले असतांनाच, भिकारी समजुन दोन-चार जणांनी पुढ्यात अजुन पैसे फेकले... !


बाबांचं मन आता पालटायला लागलं... लोक काम नाही,पण भीक मात्र सहज देतात... !


त्यांना पुण्य साठवायचं असतं आणि आपल्याला भाकरी !


काळानुसार गरजा बदलतात हेच खरं...!


त्या दिवसापासुन रोज चुल पेटायला लागली... ! 


चुलीत लाकडं ढणाढणा जळायची... आणि सोबत बाबांचं मनही आणि मानही ! 


आता मन मेलं आणि याचदिवशी आणखी एका भिक्षेक-याचा जन्म झाला... !


बाबा रोज याच जागेवर येवुन बसु लागले... मिळणाऱ्या भिकेत घर आणि पोराचं शिक्षण सुरु ठेवलं... !


स्वतःचा आत्मसन्मान बाजुला सारुन ! 


हे असं एक दोन नाही तर तब्बल 11 वर्षे चाललं... ! 


माझी,यांची भेट ९ जुन २०१९ ची ! 


औषधं देता देता यांच्याशी सुर जुळले... आणि न जमलेलं गाणं ते माझ्यापाशी गात राहिले... मी ऐकत गेलो ... !


या गाण्याला ना कसला सुर,ना कसला ताल, ना कसली लय... ! तरीही कुठं तरी खोलवर रुतुन बसणारं... हे गाणं मुक्तछंदातलं...!  


'एक सर्वसामान्य आयुष्य जगणारा माणुस आज परिस्थितीपायी भिक मागतो... बाबा खुप वाईट वाटतं मला.' मी बोलुन गेलो. 


'नाही डाॕक्टर,मी विसरलोय जुनं सारं आता. अहो विस्मरण हा आजार आहे म्हणतात.


पण खरं सांगु ? विस्मरण हे आपल्याला मिळालेलं एक वरदान आहे.एखाद्या गोष्टीचं सारखं स्मरण होणं हा खरा आजार ! अहो विस्मरण झालं नसतं तर माणुस जगुच शकला नसता.आपण पडलो होतो, हे जर विसरलोच नाही तर उठुन उभं रहायची आठवण कशी येणार ?' ते हसत बोलले होते. 


डोळ्यांची जागा रिकामी आहे यांच्या... 


पण या पोकळ जागेत मला सारं विश्व दिसलं या वाक्यानं...! 


'एकाही नातेवाईकाने मदत केली नाही तुम्हाला बाबा ?' मी शेजारी बसत विचारलं होतं. 


माझ्या आवाजाचा अंदाज घेत माझ्याकडे पहात ते खोल आवाजात बोलले,'आपल्याकडे पैसा - पद - प्रतिष्ठा जर असेल तरच नाती आपल्याला जवळ घेतात. 


पैसा - पद - प्रतिष्ठा यांपैकी मात्र आपल्याजवळ काहीच नसेल तर ना-ती तुमची,ना-ती माझी !' 


'ना-ती तुमची,ना-ती माझी !' खरंय बाबा,मी आवंढा गिळला. 


अहो डाॕक्टर,पैसा पद प्रतिष्ठा असेल तर नुसतं जवळ जाताच सारी बंद दारं आपोआप उघडतात... मात्र एकदा का हे तुमच्याकडनं गेलं की उघड्या दारावर टकटक केली तरी आतुन कुणी आपल्याकडे ढुंकुन पहात नाही... पाहिलंच तर पाहणाऱ्याच्या नजरेत भाव असतो... ऐ,चल हो पुढं ! 


या अर्थानं आपणही सारे भिकारीच !' हातात घातलेला बुट नीट करत ते बोलले.रस्त्यावरच्या शाळेत तयार झालेलं बाबांचं तत्वज्ञान ऐकुन मी थरारलो...!


'तसे आले होते काही लोक मदत करायला... किमान तसं त्यांना दाखवायचं होतं.ते किनाऱ्या किनाऱ्याने फिरत होते... पण ते येईपर्यंत आम्ही केव्हाच बुडुन गेलो होतो...सापडणार कसे ?' ते पुन्हा हसले,त्यांच्या त्या केविलवाणं हसण्यानं, रडण्यालाही लाज वाटावी...


'बुडण्याचं दुःख्खं नसतं डाॕक्टर,आपल्याला पोहता येत नाही याचंही दुःख्खं नसतं... पाण्यात ढकलणारा जेव्हा आपलाच असतो ते खरं दुःख्खं !' 


डोळे नसलेल्या जागेतुन आता अश्रुंची धार लागली होती...ऊगम सापडत नसलेला,तरीही समोरुन वहात असलेला झरा असाच असावा का ?


असे कितिक झरे वाहतात आणि नंतर आटुन जातात...! 


'बाबा, तुमच्या पत्नीने खुप साथ दिली तुम्हाला... तुम्ही दोघं एकमेकांबरोबर होतात म्हणुन निभावलं.' मी त्यांचा हात हाती धरुन म्हणालो. 


'हो, खरंय ते...! पण डाॕक्टर तुमच्या गणिताच्या पुस्तकात असतात तशी गणितं आयुष्यात घडत नाहीत.'


'दोन मधुन एक वजा झाला तर प्रत्येकवेळी एक उरतोच असं नाही.पाय गेल्यावर आमच्या दोघांतुन मी वजा झालो तेव्हा ती शुन्य झाली होती... आमच्या आयुष्याच्या गणितात दोन वजा एक बरोबर शुन्य झालं होतं...!' 


खरंच पुस्तकातलं ज्ञान काहीवेळा पुस्तकातल्या पानांतच मिटुन राहतं... पिंपळाच्या जपलेल्या पानासारखं! 


कालांतरानं त्याची नक्षीदार जाळी होते... दिसायला दिसते छान... याच जाळीला आपण फ्रेम करुन भिंतीवर लावतो पदवी म्हणुन... !


पुस्तकातल्या ज्ञानानं पदवी मिळते ... पण, माणुस म्हणुन पद मिळवायचं असेल तर पुस्तकाबाहेरच यावं लागतं !


पदवीच्या या जाळ्यात मग आपणच अडकत जातो... खुप काही मिळवता - मिळवता,... बरंच काही हरवुन येतो...! 


 'बाबा, मी काय मदत करु तुम्हाला ? ' बाबांच्या पाटाला हात  लावुन मी विचारलं. 


'काय मदत करणार आता डाॕक्टर ? राहुद्या चाललंय तेच बरं आहे.' ते शुन्यात बघत म्हणाले असावेत.त्यांच्यापुढं सारंच शुन्य होतं. 


'बाबा, मुलाचं शिक्षण करु,ट्रस्टच्या माध्यमांतुन...' मी चाचरत बोललो. 


ते तिसरीकडे पहात हसत म्हणाले... 'बघा प्रयत्न करुन,तो तयार होईल की नाही माहित नाही... !' 


'म्हणजे ?' 


'डाॕक्टर,तुम्ही घरी या,त्याच्याशीच बोला...' बाबांनी हसत पुन्हा हातातला बुट सावरला. 


यानंतर पत्ता घेवुन एकेदिवशी मी त्यांच्या घरी  पोचलो.


वाळुत मणी शोधावा तसं मी त्या झोपडपट्टीतुन बाबांचं घर शोधलं...! 


बोळाबोळांतुन वाट काढत मी घरात आलो... ! 


६x६ फुटांचं हे घर ! 


ते काॕटवर बसलेले बाबा दिसतात का ?

अं ... हो हेच ते ... ! 


पत्र्याच्या या घरांत लख्ख उजेड ! घर अतिशय स्वच्छ आणि लखलखीत ! 


एका कोपऱ्यात लोखंडी काॕट,त्यावर अनेक ठिकाणी शिवलेली पण स्वच्छ चादर... काॕटखाली नीट रचुन ठेवलेली अंथरुणं आणि शिस्तीत मांडलेली भांडीकुंडी.


दुस-या कोपऱ्यात देव्हारा...! त्यात लावलेली अगरबत्ती मंद जळत सुवास देत होती... 


एका ठिकाणी बाबांचा मुलगा,जमिनीवर पोतं टाकुन,त्यावर पुस्तकं मांडुन अभ्यास करत होता... 


उरलेल्या ठिकाणी स्वयंपाक सुरु होता... ! बाजुला बसल्येय ती बाबांची पत्नी ! 


पातेल्यात भात घातला असावा.शिजत असलेल्या भाताला इतका सुंदर सुवास येतो... मला आजच कळलं... !


पत्र्याच्या या घरात खुप प्रसन्न वाटत होतं ! 


अगरबत्ती आणि भाताचा वास एकमेकांत मिसळुन अजब मिश्रण तयार झालं होतं... ! 


भुक आणि भक्ती या पत्र्याच्या घरात आज एक झाली असावी का ?


भिंतीवर टांगलेला एक स्वच्छ आरसा,त्यालाच अडकवलेला एक कंगवा... ! 


मी सहज आरशात पाहिलं... मला  माझ्यासह ते तिघेही आरशात दिसले... 


भिंतीवरच्या त्या आरशाने चौघांनाही एकत्र चौकटीत घेत "कोन" साधला होता... 


आणि याबरोबरच "मी कोण" हा प्रश्नही आता माझ्यापुरता सुटला होता... ! 


मी मुलाला विचारलं, 'काय करतोहेस सध्या...?' 


सर सुक्ष्मजीवशास्त्र या विषयामध्ये ग्रॕज्युएशन करतोय मी...! 


मी उडालोच.... ! 


भीक मागत बाबांनी पोराला सुक्ष्मजीवशास्त्र सारख्या किचकट विषयाच्या डिग्रीपर्यंत ओढत आणला ? 


आश्चर्यानं मी बाबांकडे पाहिलं.या बाबांच्या पाया पडावं !  


'Greattt यार,मला तुझा अभिमान आहे...' मी त्याच्याजवळ जात म्हणालो.


'तुला माहित आहे,बाबांची अवस्था सध्या बिकट आहे,माझी संस्था आहे,लोकांच्या आश्रयावर ती चालते,या माध्यमांतुन तुला आम्ही शिक्षणासाठी मदत करु शकतो... !' मी थोडक्यात त्याला सर्व सांगितलं. 


'सर, तुम्ही भिका-यांनी भीक मागु नये म्हणुन प्रयत्न करता ना ?' चेह-यावरची रेषाही न हलवता तो  म्हणाला.


'हो...' मी बोलुन गेलो. 


'मग ? मलाही तुम्हाला भिकारीच बनवायचं आहे का ?' तो शांतपणे  पुस्तकं आवरत म्हणाला. 


'म्हणजे ... ?' मी घाम पुसत आश्चर्यानं बोललो.


'सर,पप्पांनी आजपर्यंतचं माझं शिक्षण भिकेवरच केलं... माझ्यापायी त्यांना भीक मागावी लागली,याची बोच मला आयुष्यंभर टोचणार आहेच.' तो मान वळवत म्हणाला. 


'खरंय ते,त्यावेळी इलाज नव्हता मित्रा, परिस्थितीनुसार जे वाट्याला आलं ते त्यांनी केलं,आज आपण ही परिस्थिती बदलु शकतो.' मी समजावलं. 


'तुम्ही एका माणसाची भीक थांबवुन आता त्याच्या पोराला भीक घालुन,आणखी एक भिकारी तयार करताय असं नाही वाटत सर तुम्हाला ?' त्याने माझ्यावर नजर रोखत विचारलं. 


मी अचंबीत झालो ! 


मला या शब्दांचा राग आला आणि वाईटही वाटलं... 


म्हटलं, ' तुला काय म्हणायचंय नेमकं बोल मित्रा... मी तुला मदत करायला आलोय... भीक द्यायला नाही.भिक आणि मदत यात फरक आहे.पण,ठिक आहे,तुझी स्वतःचीच इच्छा नसेल तर माझी बळजबरी नाही.' निघण्याच्या तयारीनं नाराज होवुन मी जायला उठलो. 


'सर...' पाठीमागनं आवाज आला त्याचा,मी वळुन पाहिलं. 


 'मी सुद्धा तेच म्हणतोय,भीक नको,मदत करा मला...! पुढचं वाक्य त्यानं पुर्ण केलं.


' वेडा आहेस का रे तु ? इतकावेळ मी काय बोलतोय मग मघापासुन ?' वैतागुन मी बोललो. 


यावर त्याने हात जोडले आणि म्हणाला, ' सर पार्ट टाईम जाॕब बघा मला,मी शिकत शिकत काम करेन... काम करत करत शिकेन... मिळणाऱ्या पैशांत मी माझं शिक्षण करुन, कुणीतरी होवुन आईबापाला सुखात ठेवेन !' 


'आज तुम्ही मला शिक्षणाला मदत केलीत तर उद्याही तुम्ही आणखीही अशीच काहीतरी मदत करावी असं मला वाटेल,तुम्ही ती  करालही ! पण,याची मला सवय लागेल... आणि मी कायम तुमच्यावरच अवलंबुन राहीन, स्वावलंबी व्हायला मला वावच मिळणार नाही...

शिक्षणाची मला भीक नको,नोकरीची मदत करा...' आता त्याच्या डोळ्यात पाणी होतं.


मी भारावुन गेलो... बाणेदारपणा आणि स्वाभिमान हे शब्द पुस्तकांतले... आज प्रत्यक्षच मी अनुभवत होतो... ! 


भीक म्हणजे दुस-याला आपल्यावर

अवलंबुन ठेवणं.! मदत म्हणजे दुस-याला 

स्वावलंबी बनवणं ...!


अवलंबुन नका ठेवु त्यांना आपल्यावर, स्वावलंबी बनवा ! 


घसा फाटेपर्यंत रोज मी हेच बोलत असतो. 

हे पोरगं आज माझीच वाक्यं बोलतंय... ! 


माझ्या डोळ्यांतुन पाणी वहायला लागलं... उठुन त्याला मिठी मारत म्हणालो, 'आज मला तुझ्या तोंडुन ही वाक्यं ऐकुन एक लढाई जिंकल्याचा भास होतोय...!'


बोलता बोलता मी बाबांकडे पाहिलं... 


त्यांना दिसत काहीच नव्हतं,पण आजुबाजुला चाललंय ते सर्व कळत होतं.त्यांच्या चेह-यावर अतिव समाधान होतं आणि चेह-यावरुन वहात होता उगम नसलेला झरा ! 


म्हणाले, 'डाॕक्टर, मनात असुनही आम्हाला स्वाभिमान जपता नाही आला...परिस्थितीनं भिकारी म्हणुन जगायला लावलं... आयुष्यात पोराला बाकी काही देता आलं नाही...पण स्वाभिमान मात्र भरभरुन दिलाय त्याला ... मी भिकारी म्हणुन जगलो... पण त्याने तसं जगु नये,हिच शिकवण  दिली आयुष्यंभर ...! 


चला या निमित्तानं त्याची परिक्षा झाली,तो पास झाला आयुष्याच्या या परिक्षेत !' असं म्हणत ओंजळीत चेहरा लपवुन ते ढसाढसा रडायला लागले... ! 

काय बोलावं ? 

सर्व शब्द आणि भावना थिट्या पडतात.

अशा माणसांपुढे ! 


यानंतर बाबा व त्यांच्या पत्नीसाठी मी सुद्धा नोकरी शोधली पण मिळाली नाही...


म्हणुन घरबसल्या औषधांची पाकिटं करणे वैगेरे अशी माझ्याचकडे यांना कामं देवुन संस्थेला मिळणाऱ्या डोनेशन मधुन या दोघांना पगार चालु केला आहे. 


बाबा आता भिक मागत नाहीत, कुणी विचारलं तर अभिमानानं ते सांगतात, मी आणि माझी बायको सोहम ट्रस्टमध्ये काम करतो. 


मुलाच्या म्हणण्यानुसार त्याला पार्ट टाईम जाॕब शोधुन दिलाय,तो स्वतः कमवत शिकतो,घरही चालवतो... पुर्ण स्वावलंबी होवुन ! 


पाच पैशांचीही मदत घेण्याचं त्यानं नाकारलं आहे... ! 


सुक्ष्म जीवशास्त्रातली मास्टर डिग्री पुर्ण करुन या विषयांत त्याला नविन संशोधन करायचं आहे...सायंटिस्ट होणं हे त्याचं स्वप्नं आहे ! 


त्या दिवशी त्यांच्या घरातुन बाहेर पडतांना, एकानं विचारलं,डाॕक्टर इकडं या झोपडपट्टीत काय करत होता ? अच्छा,तुमच्या त्या पांगळ्या भिका-याच्या घरी गेला होता काय ?


पांगळा कोण ? जगातला सर्वात सशक्त बाप आहे तो... ! सर्व असुनही कारणं देणारे आपण  पांगळे असतो ! 


मी परत वळुन त्या पत्र्याच्या शेडकडे पाहिलं... 


शेड कसलं ते ?


एका श्रीमंत बापाचा महाल होता तो... ! 

एका भावी सायंटिस्ट ची प्रयोगशाळा होती ती ! 

इथंच तो घडतो आहे !!! 


आज या ठिकाणी मी आलो... भविष्यात जगातली लोकं येतील...एव्हढा मोठा सायंटिस्ट आधी कुठं रहात होता ते पहायला... ! 


आजचं हे शेड... उद्याचं स्मारक आहे... ! 

हे स्मारक आहे एका बापाच्या जिद्दीचं ! 

हे स्मारक आहे एका पोराच्या स्वाभिमानाचं ! 

हे स्मारक आहे एका भिक्षेक-यांनं सोडलेल्या भिकेचं ! मी मनोमन नतमस्तक आहे या स्मारकापुढं !


९  जुन २०२०


डाॕ.अभिजीत सोनवणे,भिक्षेकऱ्यांचे डॉक्टर


तळटिप - एकदा साहेबांना मी फोन लावला होता.हे माझे प्रेमळ मित्र आहेत.त्यावेळेस त्यांच्याशी बोलत असताना.चकवा चांदण या पुस्तकातील एक प्रसंग सांगितला जो पुढीलप्रमाणे होता.


" इफ यू आर लुकिंग फॉर 

अ मेमोरियल,लुक अराउंड " 

" स्मारक शोधत असाल तर आजूबाजूला बघा." 


हुगो वुड या वनाधिकाऱ्याच्या समाधीवरील एका शिळेवरील स्पष्ट दिसत नसणारी अक्षरे.. यावेळी उत्तर देताना त्यांनी सांगितलेले तत्वज्ञान..


'स्मारक शोधू नका.... असं काहीतरी करा.... स्वतःचा स्मारक बनेल'- डॉ.अभिजीत सोनवणे.

२७/१०/२३

जागरूक मातृत्व आणि पितृत्व.. Conscious motherhood and fatherhood..

साधारणपणे मी माझ्या व्याख्यानांचा समारोप असा करतो :आपल्या आयुष्यातल्या प्रत्येक गोष्टीसाठी आपण स्वतः जबाबदार असतो. आता असं बोलल्यावर लोकांना त्यांच्यावर येत असलेली जबाबदारी पेलवत नाही आणि त्यामुळे त्यांना मी फारसा आवडतही नसेन.आपल्या आयुष्यासाठी आपणच जबाबदार या विचारानं त्यांच्या मनावर ओझंच येतं.माझ्या एका व्याख्यानाच्या अशा समारोपानंतर एक महिला इतकी अस्वस्थ झाली की,

आपल्या पतीला घेऊन ती मला स्टेजमागे भेटायला आली.तिनं माझ्या समारोपाच्या वाक्याचा अश्रूंच्या लोंढ्यासह विरोध एक केला. "माझ्या आयुष्यातल्या काही शोकाकुल करणाऱ्या घटना मला अजिबात नको होत्या आणि तुम्ही असं कसं म्हणू शकता की त्यासाठी मी स्वतःच जबाबदार आहे?" हा प्रश्न तिनं मला विचारला. "तुमचं हे वाक्य तुम्ही बदलायला हवं " ती मला आग्रह करू लागली.मलाही हे जाणवलं की, इतरांच्या मनात अपराधी भावना निर्माण व्हावी, हा काही माझा हेतू नाही.

माझ्या त्या वाक्यानं लोकांच्या मनात अपराधी भावना निर्माण होत आहे.सामान्यतः आपण आपल्या समस्यांसाठी दुसऱ्या कोणावर तरी ठपका ठेवण्यात फार तत्पर असतो.आपल्या आयुष्यातल्या सगळ्या वाईट घटना दुसऱ्या कोणाच्या तरी वागण्यामुळे निर्माण होत आहेत,असं समजण्याची आपली वृत्ती असते,तिलाच माझ्या त्या समारोपाच्या वाक्यानं धक्का बसत होता.मग मी विचार केला, त्या महिलेशी चर्चा केली,समारोपाचं वाक्य असं बदललं की,मग ती महिला संतुष्ट झाली. ते वाक्य मी असं केलं : 


तुमच्या आयुष्यातल्या सगळ्या गोष्टींसाठी तुम्ही स्वतः जबाबदार असता;पण केव्हापासून? तर तुम्हाला जेव्हा समजतं की,तुम्हीच तुमच्या आयुष्यातल्या गोष्टींना जबाबदार आहात,तेव्हापासून तुम्हाला जेव्हा ते माहीतच नव्हतं,तेव्हाच्या काळातल्या गोष्टींसाठी तुम्ही स्वतःला अपराधी समजू नका. 


जागरूक पालक असणं म्हणजे काय,हे माहीत नसताना तुम्ही पालकत्व पार पाडलं असेल आणि त्यात काही चुका झाल्या असतील, तर त्याबद्दल तुम्हाला दोष देता येणार नाही; पण जागरूक पालकत्व म्हणजे काय,हे समजल्या

नंतरही तुम्ही तुमच्या मुलांना वाढवताना चुका केल्या तर मात्र तुम्ही अपराधी ठराल.एकदा का तुम्हाला हे सत्य समजलं की, मग तुम्ही तुमच्या वर्तणुकीत योग्य ते बदल करालच...


आता आपण पालकत्वाविषयी बोलतोच आहोत, तर हेही लक्षात घ्या की,तुम्ही तुमच्या सगळ्या मुलांसाठी समान पालक नसता.प्रत्येक मुलाच्या बालपणाच्या वेळी तुम्ही स्वतः वेगवेगळ्या परिस्थितीतून जात असता,ज्याचा आपोआपच तुमच्या वागण्यावर परिणाम होत असतो. शिवाय,तुम्ही सगळी मुलंही एकसारख्या स्वभावाची नसतातच.त्यांच्या स्वभावात जमीन अस्मानाचा फरक असू शकतो.मी आधी असं समजत होतो,की माझ्या वेगवेगळ्या स्वभावाच्या दोन अपत्यांबाबतीत मी समान वागलो होतो; परंतु जेव्हा नीट विश्लेषण करून पाहिलं,

तेव्हा मला कळलं,की असं नव्हतं.माझं पहिलं अपत्य जन्माला आले,तेव्हा माझ्या करिअरची सुरुवात होत होती.अति काम आणि त्यासोबतच काम टिकण्याबाबतची खात्री नसणं,यामुळे मी जरा तणावातच असे;पण दुसऱ्या अपत्याच्या जन्माच्या वेळी मी स्थिरावलो होतो,संशोधक म्हणून ख्याती मिळाली होती,

मला आत्मविश्वास आला होता.यावेळी मी माझ्या अपत्यांबरोबर जास्त वेळ घालवू शकत होतो.


पालकांच्या अजून एका घट्ट समजुतीबद्दल मी त्यांना काही सांगू इच्छितो.ही समजूत म्हणजे मुलांची हुशारी किंवा चलाखी वाढवण्यासाठी त्यांना बाजारात उपलब्ध असलेले असंख्य शैक्षणिक खेळ गरजेचे असतात.नाही, पालकांनो,असं मुळीच नाही.तुम्ही त्यांच्याबरोबर घालवत असलेला वेळ,त्यांच्याशी बोलणं, खेळणं यामुळे त्यांची हुशारी वाढते,बाजारी शैक्षणिक खेळांमुळे नव्हे.(मेंडिस आणि पीर्स २००१.) पालकांनी मुलांना वेळ दिला, त्यांच्यासोबत ते राहिले,त्यांचे कुतूहल शमवणारे खेळ पालकच मुलांबरोबर खेळले,त्यांच्या निर्मितीक्षमतेला वाव मिळेल,अंस त्यांना वागू दिलं तर हे सगळं मुलांच्या विकासाला फार फार उपयोगी पडतं,त्यांच्या आयुष्यात हेच कामाला येतं.


अर्थातच मानवाला त्याच्या बालपणात काय हवं असतं,तर प्रेमानं केलेलं पालनपोषण आणि भरपूर लोकांचा सहवास,ज्यातून ते बालक चालणं,बोलणं,रीतिरिवाज शिकतं. अनाथालयातल्या बालकांना केवळ पाळण्यात ठेवून वेळच्यावेळी अन्न,पाणी,औषधं इतकंच दिलं जातं,ते काम करणाऱ्या व्यक्तीच्या मनात त्या सगळ्यांबद्दल खूप प्रेम असेल असं नसतंच. त्या अश्राप बालकांना कधी प्रेमळ हास्य,घट्ट मिठ्ठी किंवा गालावरचा पापा मिळत नाही, त्यांच्या विकासात अतिशय गंभीर समस्या येतात.


रोमानियातल्या अशा एका अनाथालयातल्या मुलांचा अभ्यास मेरी कार्लसन यांनी केला.त्या हार्वर्ड वैद्यकीय महाविद्यालयातल्या मज्जाजैवशास्त्रज्ञ आहेत. प्रेमाचा स्पर्शही न होता,केवळ अन्नपाणी वेळच्या वेळी देऊन वाढवलेल्या त्या मुलांची वाढ योग्य तऱ्हेनं न होता खुंटली आणि त्यांचं वागणं सामान्य मुलांसारखं न राहता विचित्र झालं,असं त्यांना या अभ्यासातून दिसून आलं.


कार्लसन यांनी या अनाथालयातल्या काही महिने ते तीन वर्ष,या वयोगटातल्या साठ मुलांचा अभ्यास केला.या मुलांच्या लाळेतून त्यांनी त्यांच्या रक्तातलं कॉर्टिसोलचं प्रमाण तपासलं. ज्या मुलांच्या रक्तात कॉर्टिसोलची पातळी जास्त होती,त्यांच्या वाढीवर जास्त विपरीत परिणाम झाला, असं त्यांना दिसून आलं. (होल्डन१९९६.)



कार्लसन आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी माकडं आणि उंदीर यांच्यावरही याबाबतीत संशोधन केलं आहे.पिलांना होणारा आईचा स्पर्श आणि रक्तातलं कॉर्टिसोल यांचा त्यांच्या विकासावर काय परिणाम होतो,याचा अभ्यास त्यांनी केला. त्यात त्यांना असं दिसून आलं की,आईच्या स्पर्शाचा पिलांवर अतिशय चांगला परिणाम होतो,

अमेरिकेच्या मानवी आरोग्य आणि बालविकास विभागाच्या राष्ट्रीय आरोग्य संस्थेचे माजी निर्देशक

जेम्स प्रिस्कॉट यांनीही याबाबत संशोधन केलं आहे.माकडांच्या ज्या नवजात पिलांना आईचा स्पर्श मिळत नाही,ती त्यांच्या पुढच्या आयुष्यात हिंसकपणे वागतात, असं प्रिस्कॉट यांना दिसून आलं.(प्रिस्कॉट १९९६ आणि १९४०.) प्रिस्कॉट यांनी असाच अभ्यास मानवजातीसाठीही केला.यात त्यांनी विविध संस्कृतींच्या समाजांच्या तुलनात्मक नोंदी केल्या. त्यात त्यांना असं आढळून आलं,की ज्या समाजात मुलांना प्रेमानं वागवलं जातं, आई-वडिलांचा सहवास आणि वागणुकीची मोकळीक मिळते,योग्य वयात योग्य तऱ्हेनं लैंगिक शिक्षणही दिलं जातं,तो समाज शांत जीवन जगतो.

शांततेनं जीवन जगणाऱ्या समाजांमध्ये त्यांना एक गोष्ट विशेषत्वानं लक्षात आली.ती म्हणजे,या समाजात बालकांना त्यांच्या आई-वडिलांचा नुसता सहवासच मिळतो असं नाही,तर त्यांना आई-वडिलांची शारीरिक जवळीकही खूप जास्त प्रमाणात मिळते.हे पालक दिवसेंदिवस आपल्या तान्ह्यांना आपल्या कडेवर किंवा पाठीवर वागवतच आपापली कामं करतात,असं प्रिस्कॉट यांना आढळून आलं. याउलट,ज्या समाजांमध्ये तान्ह्यांना,

बालकांना आणि किशोरांना मायेच्या स्पर्शापासून दूर ठेवण्याचीच प्रथा आहे,त्या समाजातली बालकं पुढच्या आयुष्यात रुक्ष,कठोर स्वभावाची आणि सहजपणे हिंसक होणारी असतात,असं दिसून आलं आहे.


अशा समाजातल्या मुलांना,ज्यांना मायेचा स्पर्श मिळालेला नसतो त्यांना ज्ञानेंद्रियांबाबतची अजून एक समस्या भेडसावते. शरीरानं जाणून घेण्यासारख्या संवेदना,उदा.दाब,वेदना, इतर

ओळखण्याची शक्ती त्यांच्यात कमी झालेली दिसते.

या समस्येसोबतच एक लक्षण चिकटूनच येतं,ते म्हणजे त्यांचं शरीर तणावाच्या संप्रेरकांची उसळणारी पातळी खाली आणू शकत नाही.ही स्थिती म्हणजेच हिंसक वागणुकीची पूर्वस्थिती असते.


अमेरिकन समाजात दिसून येणाऱ्या मोठ्या हिंसाचार मागची कारण आपल्याला या संशोधनावरून समजून येतील.आपली सध्याची वैद्यकीय आणि सामाजिक स्थिती अशी आहे की ज्यात मुलांना फार जवळ घेणं,रात्रभर कुशीत झोपवणं,कडेवर घेऊन फिरणं हे फारसं शिष्टसंमत समजले जात नाही.इथेच नेमक चुकते.याहूनही भयंकर म्हणजे आपले डॉक्टर्स पालकांना अशी सूचना देतात की,बाळाला स्वतंत्र करा,सारखं सारखं त्याच्या रडण्याकडे लक्ष पुरवत बसू नका,त्याच त्याला झोपू दे,तुम्ही थोपटून झोपवू नका... आधुनिक वैद्यकशास्त्राचं नैसर्गिक प्रक्रियेवर हे सरळसरळ भयंकर अतिक्रमण आहे.

बालकांना पालकांची माया मिळणं,हा त्यांचा नैसर्गिक हक्क आहे,तो हक्कच या अशा विकृत समजुतीमुळे हिरावून घेतला जात आहे.या समजुती विज्ञानावर आधारित आहेत हा समज आहे आणि नैसर्गिक पद्धतीपासून दूर जाऊन या वेडगळ आणि क्रूर पद्धतीनं मुलांना वाढवलं जात असल्यामुळेच अमेरिकन समाजात हिंसाचार थैमान घालत आहे.www.violence.de.

या वेबसाईटवर,स्पर्श आणि हिंसाचाराचं नातं सांगणारं पूर्ण संशोधन उपलब्ध आहे.


मग,अभावग्रस्त पार्श्वभूमीवर वाढलेल्या रोमानियन मुलांचं काय?चांगली पार्श्वभूमी नसूनही त्यातली काही मुलं चांगली कशी वागत.त्यांची 'जनुक' चांगल होती म्हणून? तुम्हाला आतापर्यंत समजलंच आहे,की मी जनुकांवर इतका विश्वास ठेवत नाही.शक्यता अशी आहे, की ही बालकं गर्भावस्थेत असताना त्यांच्या आई-वडिलांनी नीट काळजी घेतली असेल आणि मग अनाथालयातलं पोषण मिळून एकूणात ही मुलं चांगल्या वागणुकीची झाली असतील.


मुलं दत्तक घेणाऱ्यांनीही यातून धडा घेण्यासारखा आहे.ही मुलं त्यांनी दत्तक घेतली, तेव्हापासूनच त्यांचा जन्म सुरू झाला,असा विचार या पालकांनी करू नये.ती मुलं आधीच त्यांच्या नैसर्गिक आई-वडिलांच्या वागण्यानुसार घडलेली असण्याची शक्यता दत्तक पालकांनी नेहमी लक्षात ठेवावी.ते त्या आई-वडिलांना नको असण्याची भावना त्या बालकानं सहन केली असणार.त्यातल्या काही सुदैवी मुलांना घडणीच्या काळात प्रेमळ काळजीवाहक मिळाले असण्याची शक्यता असू शकते.दत्तक मूल घेणाऱ्या पालकांना जर गर्भावस्थेतही बालकाची घडण होते,याची कल्पना नसेल तर त्यांच्या आणि दत्तक मुलांच्या एकत्र आयुष्यात समस्या उद्भवू शकतात.हे मूल मनाची पाटी कोरी घेऊन त्यांच्या आयुष्यात आलेलं नाही,हे त्यांना समजून घ्यावं लागेल. 'द बायोलॉजी ऑफ बिलीफ,अनु.शुभांगी रानडे -बिंदू,साकेत प्रकाशन'


 (तसं तर कुठलंच मूल जन्माला येताना मनाची पाटी कोरी ठेवून येतच नाही, गर्भावस्थेत असताना ते काही गोष्टी ग्रहण करून मगच जन्माला आलेलं असतं.) 


दत्तक पालकांनी हे सत्य एकदा समजून घेतलं, की मग त्यांचं मुलांसह आयुष्य सोपं होईल, प्रसंगी मुलांच्या काही समजुती बदलण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागणार आहेत,हे त्यांना कळेल आणि ते त्याप्रमाणे वागू शकतील. 


नैसर्गिक किंवा दत्तक आई-वडिलांनी एक गोष्ट नीटपणे समजून घेतलीच पाहिजे तुमच्या मुलाची जनुक ही त्यांच्या क्षमतेच्या संभाव्य शक्यता फक्त दाखवतात त्यांचं नशीब नाही.त्यांच्या क्षमता पूर्णपणे विकसित होतील, असं वातावरण त्यांना मिळू देणं, हे तुमच्या हातात असतं.


मी हे सगळं सांगतोय,त्याकडे बरेच लोक आकर्षित होतात,बौद्धिकदृष्ट्या त्यांना ते पटतं, माझी पालकत्वावरची पुस्तकं त्यांना वाचायला हवी असतात;

पण माझं असं मत आहे,की केवळ बौद्धिकदृष्ट्या पटणं हे पुरेसं नाही.मी तुम्हाला पालकत्वावरची पुस्तकं वाचायला सांगत नाहीच.मलासुद्धा बुद्धीला हे आधी सगळं माहीत होतंच.नुसतं माहीत असणं किंवा वाचणं पुरेसं नाही.ते सगळं कृतीत आणलं पाहिजे. 


सजग पालकत्व ही फक्त समजून घेण्याचीच नाही,तर सदैव आचरणात आणण्याची गोष्ट आहे,हे लक्षात घ्या. केवळ पुस्तक वाचून आता आपण सजग पालक आहोत हे समजणं म्हणजे,एखाद्या रोगासाठी एक गोळी घेऊन,आता तो रोग बरा होईल,असं समजण्यासारखंच आहे. 


असं आपोआप काही होत नसतं.पोहावं कसं,हे फक्त समजून घेऊन तुम्ही बुडताना वाचू शकाल का? नाही ना? त्यासाठी तुम्हाला पाण्यात हातपाय मारून तरंगण्याची कृती करावीच लागेल.तसंच आहे जागरूक पालकत्व.

तुम्हाला ते प्रत्यक्ष आचरणात आणावं लागेल.


मी तुम्हाला आव्हान देतो.घ्या हा जागरूक पालकत्वाचा वसा.तुमच्या मुलांची कोवळी सुप्त मनं अनावश्यक भीती आणि बंधनांपासून मुक्त ठेवा.त्यांना माया,प्रेम,विश्वास द्या.सर्वांत महत्त्वाचं म्हणजे,जनुकांवरच सगळं काही अवलंबून असतं,हा समज उपटून टाका.तुमच्या मुलांच्या गुणांचा जास्तीतजास्त विकास करणं तुमच्या हातात आहे,त्यातूनच तुम्ही तुमचं स्वतःचं आयुष्यही बदलू शकता.आपल्या मुलांशी मनाने सदैव प्रेमात गुंफलेले राहा,मग बघा आयुष्य किती सुखद असतं.तुम्ही तुमच्या जनुकांना बांधील नाही. तुमचं आणि तुमच्या बालकांचं सुंदर आयुष्य घडवणं तुमच्या हातात आहे.


मी पेशींच्या,संरक्षणाच्या आणि वाढीच्या प्रतिसादाबद्दल तुम्हाला सांगितलं आहे.तेच ज्ञान वापरा आणि आपलं शरीर वाढीच्या प्रतिसादाच्या अवस्थेत जास्तीत जास्त वेळ राहील,याचा प्रयत्न करा.म्हणजेच नेहमी आनंदात राहा,परिस्थिती बदलता आली नाही, तरी स्वतःचा दृष्टिकोन बदलता येतो,तो बदला आणि नेहमी समाधानी राहा. त्यानंतरच तुमचं शरीर तणावरहित,

निरोगी राहील.हेच तत्त्व तुमच्या लहानग्यांसाठीही वापरा.त्यांना माया,विश्वास,सुरक्षिततेची भावना पुरेपूर अनुभवू द्या,मग बघा त्यांची आयुष्यं कशी बहरतील पुढे जाऊन.


एक लक्षात ठेवा.मुलांच्या सुदृढ विकासासाठी मोठी नामवंत शाळा, मोठमोठी महागडी खेळणी,तुमचं प्रचंड उत्पन्न, यातलं काहीही महत्त्वाचं नसतं.मुलांच्या सुदृढ आणि सर्वांगीण विकासासाठी केवळ एक गोष्ट सर्वाधिक महत्त्वाची आहे.प्रेम,माया.


निष्प्रेम आयुष्याला काही अर्थ नसतो प्रेम म्हणजेच जीवनाचं जल,ते हृदयानं आणि आत्म्यानं पिऊन घ्या…


ब्रूस एच.लिप्टन ( पिएच.डी.)

२५/१०/२३

माणुसकी शिकवणारी 'हडळ '.. 'Strike' that teaches humanity..

मी नववीत असेन बहुधा.साता-यातुन मी त्यावेळी आजीकडे आलो होतो ऊन्हाळ्याच्या सुट्टीला.मे महिन्याचा शेवटचा आठवडा असावा, ढग दाटुन यायचे पण पाऊस पडायचा नाही.खुप रडावंसं वाटतं,मन भरुन येतं,पण रडु येत नाही तसंच काहिसं ! 


त्या दिवशी आजीबरोबर माझी काहितरी वादावादी झाली होती,रागानं दिवसभर जेवलो नव्हतो,तीनेही बोलावलं नाही.रागाच्या तिरीमिरीत गल्लीतल्या मित्राकडे जायला निघालो. 


संध्याकाळचे ७ वाजले असावेत.अंधार आणि उजेड एकमेकांना आलिंगन देत पहले आप पहले आप म्हणुन निरोप देत असावेत... 


निम्म्या वाटेवर आल्यावर नेमका गडगडाट सुरु झाला,

काळोख पडला आणि काय होतंय कळायच्या आत धो धो पाऊस सुरु झाला.मी चिंब... ! 


पावसापासुन बचाव करायचा म्हणुन जवळच्याच एका घरात शिरलो. 


घर कसलं ? पत्रे,गोणपाट लावुन केलेला तो एक निवारा होता.आमच्या गल्लीतलं सगळ्यात गरीब कुटुंब हे... ! 


आम्ही जीथे रहायचो,तीथे एक पन्नाशीची बाई रहायची.शेजारच्या आयाबाया तीला "हडळ" म्हणायच्या.ती दिसायलाही होती तशीच. 


डावा डोळा एकदम बारीक,या डोळ्यात काळं बुब्बुळ नव्हतंच,आख्खा डोळा पांढराफेक, उजवा डोळा बाहेर आल्यासारखा बटबटीत, आतलं बुब्बुळ तीच्या मर्जीविरुद्ध कुठेही गरागरा फिरायचं,या वयातही चेहरा सुरकुतलेला,पांढरे केस पिंजारलेले,तोंडात मोजके दात,

त्यातुन समोरचा एक पडलेला,दुसरा ओठातुनही बाहेर आलेला,अंगावर लुगडं घातलंय की चुकुन अंगावर पडलंय अशी शंका यावी असं नेसलेलं, रंगही इतका काळा,की काळ्या रंगानं लाजावं.!


एकुण अवतार भेसुर ! 


त्यांत बोलणं असं की भांडल्यागत... ! 

प्रत्येक वाक्यात शिवी... ! 


कुणीही हिच्या नादी लागत नसे,समोर दिसली तरी विटाळ व्हायचा लोकांना,अपशकुन व्हायचा त्यांना,कोणत्याही सण समारंभात हिला जाणिवपुर्वक बाजुला ठेवायचे.

लहान मुलांना तर ती हडळ तुला खाईल अशी भिती घालायचे... !


तीला जादुटोणा येतो,तीच्या घरात कवट्या आहेत वैगेरे असंही  बोललं जायचं...


हे घर तीचंच... ! 


मी नेमका याच घरात शिरलो होतो.


पत्र्याच्या त्या घरात मंद चुल पेटली होती,शेजारचा टेंभा (जुन्या डब्यात राॕकेल भरुन,जुनी नाडी टाकुन,उजेडासाठी वात पेटवलेली असे, गावाकडचा जुगाड) मिणमिणता प्रकाश देत होता. 


ती चुलीशेजारीच बसली होती,त्याच नेहमीच्या विस्कटलेल्या अवतारात... केस तसेच पिंजारलेले... चुल आणि टेंभ्याचा संमिश्र प्रकाश तीच्या भेसुर चेह-यावर पडला होता.मुळचाच भिषण चेहरा अजुन भितीदायक वाटत होता. विरुद्ध बाजुला तीचीच सावली जमिनीवर पडली होती. 


एकुण वातावरण भितीदायक ! 


मी घाबरलो, पण बाहेर पडायची सोय नव्हती... 


'काय रं...?' घोग-या आवाजात ती गरजली. 


'काय नाय,ते आपलं भायेर पाऊस म्हणुन...' मी पायानं जमिन टोकरत चाचरत बोललो. 


ती बसली होती... समोर काटवटीत भाकरीचं पीठ ओतलं होतं. 


पुर्वी डालड्याचा पिवळा डब्बा मिळत असे, त्यावर कसल्याशा झाडाचं चित्रं असे.डब्यातला डालडा संपला की त्याचे अनेक ऊपयोग असत.कुणी डाळी तांदुळ त्यांत साठवत असत,कुणी टमरेल म्हणुनही वापरे.तीनं याच डब्यात पाणी भरुन ठेवलं होतं.डब्बा काटवटी शेजारी.

डब्ब्यातलं पाणी पीठावर शिंपडुन ती पीठ तिंबत होती. 


मांजरानं उंदराला खेळवावं तसं ती पिठाशी खेळत होती, इकडुन तिकडे फिरवत होती, मध्येच चापट्या मारत होती,मध्येच पीठाचा गालगुच्चा घेत होती. 


मी हा खेळ पाहण्यात रंगुन गेलो ! 


शेवटी त्या गोळ्याचा भला मोठा लचका तीनं तोडला... दोन हाताच्या तळव्यात धरुन या लचक्याला तीनं गोल आकार दिला... आणि हातातुन पडु न देता त्या गोळ्याला हवेतच थापट्या मारु लागली,दोन्ही बाजुंनी ढोलकी बडवतात तसं...! 


एका क्षणी तर जादु झाली...या गोल गोळ्यापासुन एक सुंदर गोलाकार अशी ताटाएव्हढ्या आकाराची पोळी तयार झाली.माझी आजी पोळपाटावर भाकरी थापते,हिनं हवेतच ती केली.हिच्या अंगात नक्की जादुटोणा असावा अशी माझी खात्री पटली. 


यानंतर तीने बनवलेली ती कलाकृती धाप्पदिशी, चुलीवरल्या तापलेल्या काळ्या लोखंडी तव्यावर पसरली.डब्ब्यातनं पाणी घेवुन पुन्हा पाण्याचा हात त्या भाकरीवरनं फिरवला.शेणानं सारवलेल्या जमिनीवर उलथन पडलं होतं,तीनं आधी ते पदराला पुसलं,उलथनानं तव्याला थोडं ढोसुन चुलीवरल्या तव्याला नीट केलं आणि हातानं तव्यावरची भाकरी उलटली. 


उलटलेली भाकरी पुन्हा तव्यावरनं काढुन चुलीच्या तोंडावर तीला धग लागेल अशी ठेवली…आता त्या बाजरीच्या भाकरीला मस्त पापुद्रा आला... ती टम्म फुगली... दिवसभर मी फुगलो होतो तस्साच ! 


तीचं माझ्याकडं लक्ष नव्हतंच.बाजरीच्या भाकरीचा मंद सुवास माझ्या नाकात शिरला. 


पत्र्याबाहेर अंधार,नुकताच पडुन गेलेला पाऊस,हवेत झोंबरा गारवा,पत्र्याच्या आत चुलीमुळं निर्माण झालेली ऊबदार धग आणि माझ्या पोटात पडलेली आग ! 


मी आशाळभुतपणे भाकरीकडं पहात होतो. 

तीचं माझ्याकडं लक्ष गेलं. 

म्हणाली,'खातु का भाकर... ?' 

'छ्या..छ्या... नको मला..' एकदम हो कसं म्हणणार ?


एखादी गोष्ट मनापासुन हवी असतांना,ती मिळत असतां,नको म्हणणं काय असतं,हे त्या नको म्हणणाऱ्याला कळेल ! 


तोंडानं नाही म्हटलं तरी काही गोष्टी चेह-यावर ओघळतातच,मनात असलं - नसलं तरी !

डोक्यावर ओतलेल्या तेलाचे गालावर ओघळ यावेत तसे... ! तीला या अंधारातही ते दिसलं असावं. 


म्हणाली,' हिकडं ये...' 

जावु का नको ? मी घुटमळलो... 

'ये रं ल्येकरा,माज्याजवळ बस... ये हिकडं ...' 


मी प्रथमच तीचा हा नाजुक आणि प्रेमळ आवाज ऐकत होतो.मायेनं भिजलेला तो आवाज होता...तरीही,जवळ बोलवुन भाकरीबरोबर ही मलाच खावुन टाकणार नाही ना ? या विचारानं मी घाबरलो... तीनं पुन्हा हाक मारली,

मी पाय ओढत तीच्या दिशेनं घाबरत निघालो. 


मी जवळ येतांना पाहताच ती गालातल्या गालात मंद हसली,मी असं हसतांना या आधी कधीच पाहिलं नव्हतं.का हसली असेल ती अशी ? 


मी आणखी घाबरलो,आता पळायची सोय नव्हती,तीनं माझे हात धरले होते.


माझे थरथरते हात तीने हातात घेतले आणि झटका देत मला चुलीजवळ खाली बसवलं.चुलीजवळ असुनही मला कापरं भरलं.ती पुन्हा हसली,ओठाबाहेर आलेला दात मला अजुन भ्या दावत होता...


'कवापस्नं जेवला न्हाईस ?' डोक्यावर हात फिरवत मायेनं तीनं विचारलं. 


'सकाळपस्नं...' मी चाचरत बोललो. 


शेणानं सारवलेल्या जमिनीवरच एक जर्मनची ताटली पडली होती,तीनं ती पदरानं पुसली,त्यावर ती गरमगरम भाकरी ठेवली. 


मी अजुनही साशंक होतो,ती पुढं काय करणार मला माहित नव्हतं.तीच्याबद्दल लोक कायकाय बोलतात ते सारं आठवलं.अंगावर शहारे आले...


'तु भाकर खायाला सुरवात कर,मी तवर भाजी करते' या वाक्यानं माझी तंद्री भंगली. 


तेव्हढ्यात तीनं,बाजुला असलेली कळकटलेली एक छोटी किटली काढली,दुस-या हातानं तितकीच कळकट एक कढई चुलीवर ठेवली. 


किटलीतलं तेल कढईत टाकलं,किटलीच्या तोंडाला लागलेलं तेल तीनं बोटानं पुसुन घेतलं आणि ते बोट माझ्या केसांना लावत म्हणाली... 'रोजच्या रोज आंगुळ झाल्यावर,डोस्क्याला त्याल लावावं... कसं भुतावानी झाल्यात क्यास... !' असं म्हणत पुन्हा तेच बोट स्वतःच्या पदराला पुसलं. 


मी तीच्या पिंजारलेल्या केसांकडे पाहिलं,वाटलं मला सांगते तर मग हि का लावत नसेल डोक्याला तेल ? 


भुतावानी हा तीच्या तोंडुन आलेला शब्द ऐकुन मी अजुन घाबरलो. 


तीला याचं काही सोयरसुतक नव्हतं.शांतपणे जरा लांब हात करुन तीने मग लसणाची गड्डी काढली,जमिनीत उकरुन केलेल्या उखळात टाकली,वरवंट्यानं दणादणा चेचली आणि कढईतल्या तेलात टाकली.उखळ पुन्हा त्याच पदरानं पुसुन घेतलं...


यानंतर गुडघ्यावर हात ठेवत ती भिंतीच्या आधारानं उठली आणि कसल्याशा फडक्याखाली झाकलेली मेथीची गड्डी काढली. 


बुडख्याकडचा (देठाकडचा) भाग हातानंच पिळुन तट्दिशी तोडला आणि आख्खी मेथीची गड्डी तीनं अक्षरशःहातानं कुस्करुन कढईत टाकली.ना निवडणं,ना साफ करणं,ना देठ काढणं...! 


मेथी गरम तेलात पडली,अगोदरच खमंग तळला गेलेला तांबुस लसुण जणु मेथीची वाट बघत होता... मेथीची आणि त्याची कढईत भेट झाल्यावर "छिस्स्स" असा आवाज आला.


हा आवाज मी अजुन विसरलो नाही,विसरुच शकत नाही. 


यानंतर तीने,पुन्हा उलथन घेतलं,पदराला पुसलं, भाजी हलवली आणि त्यावर मीठ टाकलं...! 


कढईतुनच चिमटीत धरुन तीनं ही भाजी माझ्या हिरव्यागार भाकरीवर टाकली. 


मी तीच्याकडे नुसता पहात होतो. माझ्या गालावरनं खरबरीत हात फिरवत म्हणाली, 'खा ल्येकरा खा... सकाळधरनं उपाशी हायस बाबा... ' 


यानंतर मी त्या गरमगरम भाजी भाकरीवर तुटुन पडलो,मला आठवतं,मी त्यावेळी दोन भाकरी आणि सगळी भाजी फस्त केली होती.


अन्न हे पुर्णब्रम्ह याची प्रथमच जाणिव झाली. पोट तुडुंब भरलं होतं,मनही ! 


मी सहज पाहिलं काठवठीत,तीच्यापुरत्या असणा-या पीठाच्या सर्व भाकरी मी खाल्ल्या होत्या,फडक्याखाली आता भाजी शिल्लक नव्हती,डब्ब्यात अजुन पीठ शिल्लक असेल की नाही ते मला माहीत नव्हतं. 


मला माझीच लाज वाटायला लागली. 


गंमत अशी की पोट भरल्यावरच लाजेची जाणिव होते,ऊपाशीपोटी नाही !


चुलीजवळ बसुन मला घाम आला होता,मी तीच्याजवळ जात म्हणालो,'मावशी,आता तु काय खाशील ?' 


आयुष्यात पहिल्यांदाच कुणीतरी तीला मावशी म्हटलं असावं. 


तीच्या डोळ्यांतुन घळाघळा पाणी वहायला लागलं.गरागरा फिरणारे डोळे कुठंच ठरत नव्हते, हुंदका येत होता,त्यालाही ती दाबत होती...


तीने ओठ मुडपले होते,त्यांतुनही एक दांत डोकावत होताच. 


मला जवळ घेत पुन्हा त्याच पदरानं माझ्या कपाळावरला तीनं घाम पुसला. 


या पदरातुन मला वास आला शेणानं सारवलेल्या जमिनीचा,उखळात चेचलेल्या लसणाचा, डोक्याला लावलेल्या तेलाचा,माझ्याच घाबरट घामाचा आणि तीच्यातल्या पान्हा फुटलेल्या आईचा !


या पदरानं मी सुगंधी झालो ! 

आता मला तीची भिती वाटत नव्हती. 


जगात आपलं म्हणुन कुणीही नसलेली एक समाजानं टाकलेली बाई,तीच्याही नकळत आई होवुन गेली ! 


पदरालाही किती पदर असतात ना ? वरवर फाटका

दिसणारा पदर किती मजबुत असु शकतो?


प्रत्येक आई मुलाचं नातं,पदरापासुन सुरु होतं... पदराशी संपतं... ! 


या दोन पदरांतला काळ म्हणजे आयुष्य !


आयुष्यांत मला अशी बाजरीची भाकरी आणि मेथीची भाजी पुन्हा कुठंही मिळाली नाही ! 


इंटरनॅशनल कंपनीत काम करतांना अनेकानेक फाईव्ह स्टार हाॕटेलात राहिलो,जेवलो. 


मेनुकार्डवर व्हेजच्या रकान्यात शोधुन शोधुन मी मलई मेथी,बादशाही मेथी,लबाबदार मेथी,शाही मेथी कोफ्ता,

कश्मिरी मेथी रोल यासारखे अनेक पदार्थ खाल्ले असतील. 


छे ! 


स्टारवाल्या हाॕटेलात फक्त स्टारच असतात,पण मायेचा चंद्र नसतो,चांदणं नसतं !


दुधाचेही गुणधर्म वाढवायला कोजागिरीचा शीतल चंद्रच लागतो... चकाचाँद करणारे भगभगीत दिवे इथं काय कामाचे ? 


कोणत्याही पदार्थाला कसलीच चव नसतेच मुळी 

चव उत्पन्न होते ती करणा-याच्या मनातुन ! 


करणा-याचा भाव शुद्ध असला की कोणतीही अशुद्धी त्या पदार्थाला दुषित करत नाही !


संपुर्ण स्वच्छता पाळुन शिव्या देत केलेलं पंचपक्वान्नंही बाधतंच,पण कसलीही स्वच्छता न पाळता,मनाच्या गाभाऱ्यातनं जेव्हा माया,तेल आणि मिठात सोडली जाते तेव्हा मेथीची ती भाजीही अमृत होवुन जाते !


लोक याच मायाळु मावशीला हडळ म्हणायचे, का तर तीचा चेहरा भेसुर होता...


आपण चेहरा आणि कपड्यांवरुन माणसाबाबत आडाखे तयार करतो... ब-याच वेळा ते चुकतात. 


चेह-यावर रंग लावुन कलाकार मंडळी नाटक करतात,पण कोणताही रंग न लावता "नाटकं" करतात काही मंडळी,त्यांना काय म्हणावं ?


एखाद्याचं कौतुक करायला पट्कन शब्द सापडत नाहीत,भांडतांना मात्र झटपट त्यांना ते आठवतात.. याला काय म्हणायचं ? 


ज्यांना आपण आयुष्यंभर "चुकीची माणसं" समजत असतो,तेच आपल्याला कधीतरी "बरोबर अर्थ" समजावुन सांगतात... मग ते चुकीचे कसे काय ?दुस-याच्या चुका या चुका,पण आपल्या चुका म्हणजे "अनुभव" असं कौतुकानं सांगणाऱ्यांना काय म्हणावं ?  


असे दुटप्पीपणानं वागणारे लोकच मग एखाद्या व्यक्तीवर "हडळ" म्हणुन शिक्का मारतात !


एखाद्याला बहिष्कृत करतात...


या मावशीला मी गावाकडं गेल्यावर अधुन मधुन भेटायचो. 


मेडिकलच्या शेवटच्या वर्षाला असतांना एकदा भेटायला गेलो होतो.वय झालं होतं.खंगुन खाटेवर पडली होती.

आताशा तीला दिसत पण नव्हतं.... 


वयानुरुप चेहरा आणखी भेसुर झाला होता आणि आयुष्यं बेसुर ! 


जवळ कुणी जायचंच नाही.


मी भेटायला गेलो.स्मरणशक्ती ढासळलेली.तीनं ओळखलं नाही. शकाही आठवणी करुन दिल्या... मेथीच्या भाजीची आठवण सांगितली. 


मान वळवुन पुन्हा एकदा ती तशीच हसली, जशी मेथीची भाजी खायला घालतांना हसली होती पुर्वी... गुढ... गालातल्या गालात !


'काय आणुन देवु म्हातारे तुला ? ' मी हातात हात घेवुन प्रेमानं विचारलं. 


ठिगळ लावलेल्या,अंगावर चुकुन पडलंय असं वाटायला लावणाऱ्या लुगड्याकडं तीनं क्षीणपणानं बोट दाखवलं. 


'लुगडं...?' मी बरोबर ओळखलं. 


मी झट्दिशी उठलो,घरी जावुन माझ्या आजीची दोनचार लुगडी घेवुन येण्यासाठी...


तीने हातानंच खुण करत कुठं चाललास असं विचारलं.मी ही खुणेनंच सांगितलं, 'लुगडं घेवुन येतो...!' 


तीनं मला परत खुणेनंच जवळ बोलावलं...मी खाली वाकलो... 


ती कानाजवळ येवुन एकेक शब्द तोडत बोलली... 'जुनं तुज्या आज्जीचं लुगडं मला नगो, नव्वं कोरं आन... घडी मीच मोडनार... मरना-या मान्साला जुनं दिवु न्हाई काई... माज्या पोरानं मला नवं लुगडं आनलं,ह्येजातच माझा आनंद... ' हे बोलुन ती पुन्हा गुढ हसली... ! 


तीचं बोलणं ऐकुन मी शहारलो स्वतःच्या मरणाविषयी इतकी अलिप्तता ...? 


बरं तीनं कसं ओळखलं असेल ? मी जुनं लुगडं आणायला उठलोय,नवं नाही ते... ! 


मी विद्यार्थीदशेत... नवं लुगडं आणायला माझ्याकडं कुठले पैसे त्यावेळी ...? 


पण,पुढच्यावेळी आलो की घेवुन येईन असं सांगुन मी उठलो होतो. 


पुढं काही दिवसांनी डाॕक्टर झाल्यावर पुन्हा गावी गेलो.गाव चांगलंच सुधारलं होतं. 


म्हातारीचं घर मात्र पडुन गेलं होतं...पत्रे गंजले होते,ज्या खाटेवर ती झोपायची ती खाट तुटुन पडली होती एका कोप-यात लोळागोळा होवुन... गांव खरंच सुधारलं होतं !


शेजारी उभ्या असणा-या एकाला खुणेनं विचारलं,' म्हातारी कुठंय ?' 


तंबाखुची पिंक टाकत तो म्हणाला होता,'कोन ती हाडळ व्हंय ? आरं ती मेली की कवाच... कोन नव्हतं तीला...' 


पुढचं मला ऐकुच आलं नाही... ! 


कोण नव्हतं तीला ???


कसं सांगु... ? 


ती मेली नाही... माझ्या मनात ती कायम जीवंत आहे...! 


कोण कसं नव्हतं ? 

मनातुन तीनं मुलगा मानलं होतं मला ! 

आई होवुन ती गेली...! 

मलाच मुलगा होता आलं नाही... !!!


प्रत्येकवेळी आपलं मुल भेटत होतं,म्हणुन ती तशी गुढ हसली असेल का ? 


यानंतरही मी अनेकवेळा गावाला गेलो.पण गल्लीत फिरतांना हे पडकं घर मी टाळतो. 


मला भिती वाटते आणि लाजही ! 


फट्कन समोर येवुन ती नव्वं कोरं लुगडं मागेल ही भिती... आणि मी तीला ते कधी देवु शकलो नाही याची लाज ! 


डाॕक्टर झाल्यानंतर पैसे होते रग्गड माझ्याकडे... पण एक लुगडं घेण्याइतकाही मी श्रीमंत नव्हतो, त्या अर्थानं मी ही गरीबच की ! 


माणसाकडं पैसा असला की तो श्रीमंत होतो असं नाही...! 


या पैशानं जेव्हा कुणाचा दाह कमी होतो,वेदना कमी होतात,तेव्हा त्या पैशाची "लक्ष्मी" होते, नायतर नुसतेच तो कागद किंवा वाजणारी नाणी


खिशात लक्ष्मी असेल तो खरा श्रीमंत... बाकीचे नुसतेच धनिक ! नोटा आणि नाण्यांचे धनी !!!


तीच्या पडक्या घराला लोक हाडळीचं घर म्हणतात,मी त्याला आईचं स्मारक समजतो ! 


ती गेली... माझ्या डोक्यावर एका न पेलणा-या लुगड्याचं ओझं ठेवुन गेली... ! 


तीच्या घराजवळनं जातांना मी नजर चोरतो, एखादा देणेकरी असल्यासारखा... ! 


का कोण जाणे... त्या पडलेल्या घराकडं तरीही पाय वळतातच...


आणि उगीचंच भास होतो...तुटलेली ती जीर्ण खाट... माझ्याकडं बघत मंद मंद हसते आहे, गालातल्या गालात... तसंच गुढ... !!!


आणि मी पाय ओढत एकटाच  तिथुन चालायला लागतो, कुढत... कुणीच नसलेल्या एखाद्या बेवारशासारखा ... !!! 


डाॕ.अभिजीत सोनवणे,डाॕक्टर फाॕर बेगर्स

या जगात अजूनही अवलिया आहेत.अशाच अवलियांपैकी एक अवलिया या अवलियास त्याच्या महान कार्यास माझा सलाम..