* विजय गायकवाड | Vijay Gaikawad

live

नमस्कार आपले स्वागत आहे. मी पुस्तके आणि मित्रांवर पैसे खर्च करतो,माझ्याकडे दगड आणि विटांवर खर्च करण्यासाठी पैसे नाहीत.- रस्किन बाँड.ही थोर माणसं व त्यांचे विचार मला पुस्तकात भेटलीत.ती भेटली आणि त्यांनी सांगितले कि, प्रत्येक दिवशी असं काही तरी करा की,ते तुम्हाला अधिक सुंदर उद्याच्या दिशेने खूप लांबवर घेऊन जाईल."- डोग फायरबाऊ.' सर्वियन कादंबरीकार मिलोराद पावीच यांचे एक वाक्य आहे ते म्हणतात - जोवर जगात पुस्तक वाचणाऱ्या वाचकांची संख्या बंदूकधारी सैनिका पेक्षा अधिक आहे तोवर काळजीच काहीच कारण नाही.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात.पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये.म्हणून अविरतपणे प्रयत्न करणारे मार्गदर्शक, मित्र धावून येतात.प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,डॉ.दीपक शेटे,आ.भरत बुटाले,प्रा.सर्जेराव राऊत,सुभाष ढगे,अनिल फारणे,डॉ.सुधीर सरवदे ,विश्वास खाडे, विनायक पाटील,संजय कुंभार,सतीश खाडे,मनोहर सुर्वे,गणेश खंदारे,तात्या गाडेकर, दादासाहेब गाडेकर, दादासाहेब ताजणे, पुस्तकातील घटना प्रसंग सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील यांनी केलेले आहे. मला लिहिण्याची प्रेरणा देणारी पुस्तके,लेखक,प्रकाशक,मित्र ही जगावेगळी माणसं माझ्या जीवनातील महत्वाचा टप्पा आहेत.... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ.मेघा गायकवाड, चिरंजीव मयान,माझ्या धावण्यातील गुरुवर्य नामदेव बरुरे,लुल्ला शेख मोठी ताई ,लहान ताई जयश्री शिंदे या सर्वांचेच मनापासून आभार व धन्यवाद मॅट्रिक फेल विजय गायकवाड

१८/५/२५

४.२ स्पिशीज / 4.2 Species

स्पॉटेनियस जनरेशन खरं की खोटं?' या द्वंद्वात असतानाच बायॉलॉजीच्या क्षेत्रात आणखी एक प्रश्न उपस्थित झाला.तो म्हणजे आपल्याला दिसणाऱ्या,न दिसणाऱ्या,माहीत असणाऱ्या आणि माहीत नसणाऱ्या अशा सगळ्याच जिवांचं वर्गीकरण कसं करायचं? सगळ्या सजीवांना एकाच विकासाच्या शिडीवर चढवायचं की त्यांचे वेगवेगळे गट करायचे?आपल्या सभोवती इतक्या प्रकारचे असंख्य सजीव आहेत. त्यांच्यात कमीअधिक प्रमाणात साधर्म्य आणि फरक आहेत,त्यामुळे यांच्यात वर्गीकरण कसं करावं हा प्रश्न आता अनेकांना सतावायला लागला.


वर्गीकरण करायला सुरुवात केल्यानंतर तर पुढे आणखीच वेगळे प्रश्न निर्माण झाले.सजीवांची प्रत्येक जात कोणत्या निकषांवर वेगळी मानायची?आपल्याला रस्त्यात दिसणारी सगळी कुत्री एकाच जातीची आहेत का? वेगवेगळ्या प्रकारचे आंबे देणारी आंब्याची झाडं एकाच जातीची की वेगवेगळ्या ? मग कोणत्याही प्राण्याची स्वतंत्र जात किंवा स्पिशीज ही गोष्ट ठरवणार कशी? स्पिशीज या संकल्पनेची व्याख्या तरी करणार कशी ? स्पिशीज ही साधारणपणे कोणत्याही सजीवाची एकच जात असते.या जातीतले नर आणि मादी समागम करून त्याच जातीच्या सजीवांना जन्म देऊ शकतात आणि ही नवी पिढीही पुढे प्रजनन करून पुन्हा त्याच जातीच्या सजीवांना जन्म देऊ शकते,ज्या जातींच्या इंडिव्हिज्युअल्समध्ये (सदस्यांमध्ये) असे संबंध शक्य असतात त्याच जातींतले सगळे सजीव बाहेरून दिसायला जरी वेगवेगळे दिसले तरी ते एकाच जातीचे,स्पिशीजचे आहेत असं समजावं.यात मग आशियांतली माणसं असो की आफ्रिकेतली माणसं असोत,ती समागम करून पुढच्या प्रजननक्षम जिवांना जन्म देऊ शकतात,त्यामुळे सगळी माणसं ही दिसायला जरी भिन्न असली तरी ती एकाच जातीची आहेत.


पण गंमत म्हणजे आशियातले हत्ती आणि आफ्रिकेतले हत्ती दिसायला बऱ्यापैकी सारखे असले तरी ते प्रजनन करू शकत नाहीत,त्यामुळे ते दोन वेगवेगळ्या जातींत मोडतात ! गंमत म्हणजे कोणताही सजीव आपल्यासारख्याच दुसऱ्या सजीवाशी समागम करून आपल्यासारखीच प्रजा निर्माण करतो आणि नंतर ती प्रजाही पुन्हा तशाच अनेक सजीवांना जन्म देते ही संकल्पना किती जुनी असावी? ही संकल्पना चक्क निओलिथिक काळापर्यंत मागे जाते !


खरं तर स्पिशीज ही संकल्पना इतकी मोठी आणि महत्त्वाची आहे की खुद्द जीवशास्त्राची अनेक अंगांनी प्रगती होत राहिली तरी गेल्या कित्येक शतकांपासून स्पिशीज या संकल्पनेची व्याख्या करण्यात वैज्ञानिकांचं अजूनही एकमत होताना दिसत नाही! सतराव्या शतकापासून ते आज एकविसाव्या शतकापर्यंत केल्या गेलेल्या स्पिशीजच्या किमान २६ महत्त्वपूर्ण आणि मान्यता पावलेल्या व्याख्या आहेत !


मुळात जगात अस्तित्वात असलेल्या सगळ्या सजीवांचं वर्गीकरण करताना उद्भवलेला हा स्पिशीजचा प्रश्न आहे. वर्गीकरणाचा अभ्यास करणाऱ्या बायॉलॉजीच्या शाखेला 'टॅक्सॉनॉमी' म्हणतात.आणि त्यातही प्रचंड खोलात जाऊन स्पिशीज कशाला म्हणावं किंवा दोन खूपच सारखे असणारे सजीव एकाच स्पिशीजमध्ये येतात की वेगवेगळ्या ? या प्रश्नाचा मागोवा घेणारी समस्या इतकी मोठी झाली,की याच प्रश्नाची चक्क विज्ञानाची एक नवीच शाखा निर्माण झाली.तिला 'मायक्रोटॅक्सॉनॉमी' म्हणतात !


या मधला सगळ्यात अवघड प्रश्न हा आहे,की सजीवाची कोणती जात कोणत्या स्पिशीजमध्ये मोडते हे कसं ठरवणार? कारण वरवर सारखे दिसणारे प्राणी किंवा वनस्पती आपापसात लैंगिक संबंध प्रस्थापित करून प्रजनन करू शकतातच असं नाही.शिवाय,

बऱ्यापैकी वेगळ्या दिसणाऱ्या वनस्पती आणि प्राणी आश्चर्यकारक रीतीनं एकाच स्पिशीजचे घटक असतात आणि ते चक्क प्रजननही करू शकतात ! त्यातून सूक्ष्मजीवांमध्ये तर आणखीच घोळ होते.ते सगळेच आकारानं खूप लहान. त्यातून मायक्रोस्कोपखाली पाहिलं तर त्यांचा फक्त बाहेरून आकार कळणार.मग दंडुक्यांच्या आकाराचे,गोलाकार,मण्यांच्या माळेच्या आकाराचे,स्वल्पविरामच्या

(,)आकाराचे असे कित्येक सूक्ष्मजीव होते,आहेत.मग यांच्यातही काही जाती,उपजाती आहेत का ?


यातही मजा म्हणजे गाढव आणि घोडा हे वेगवेगळ्या प्रजाती असून ते कधीकधी ते चक्क समागम करतात आणि खेचराला जन्म देतात! प्राण्यांच्या आणि काही वेळा वनस्पतींच्याही अशा विचित्र वागण्यामुळे स्पिशीजचा हा प्रश्न खरं तर न उकलणारा गुंताच होत चालला होता.


खरं तर असं आहे,की स्पिशीजमध्येसुद्धा एक सलगता आहे.जसं लाल आणि पिवळा या दोन रंगांच्या वेगवेगळ्या जातींमध्ये मरून,

वाइन कलर,भगवा, केशरी,आंबा रंग अशा अनेक छटा येऊ शकतात.त्यातल्या काही लाल रंगाकडे जास्त झुकणाऱ्या आणि पिवळ्या रंगाकडे कमी झुकणाऱ्या तर काही पिवळ्या रंगाकडे जास्त झुकणाऱ्या आणि लाल रंगाकडे कमी झुकणाऱ्या असतात.प्राण्यांच्या बाबतीतही दोन भिन्न वाटणाऱ्या स्पिशीजमध्येही काही थोड्या सारख्या, काही थोड्या वेगळ्या अशा अनेक प्रजाती असू शकतात.काही वैज्ञानिकांच्या मते यांच्यामध्येही वेगवेगळ्या प्रमाणात प्रजनन होत असतं आणि त्या सजीवांचं संपूर्ण पॉप्युलेशनच या सलगतेच्या धाग्यावर कोणत्याही दिशेनं प्रवास करू शकतं । 


आणि आपल्याला आता दिसणारे सजीव हे कायम असेच आहेत असंच माणूस त्यांचा अभ्यास करताना गृहीत घरतो,ही त्यात माणसानं केलेली चूक आहे. उत्क्रांती होताना एका मूळ सजीवापासून पुढे जसे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे सजीव निर्माण होताना दिसतात,हे होताना त्यांच्यात होणारे बदल अगदी सूक्ष्म असतात,पण तेवढ्यात नव्या प्रकारच्या जिवांनी आपल्या मूळ स्पिशीजपासून फारकत घेतलेली असते! त्यामुळेच त्यांना वेगवेगळं ओळखणं ही अनेकदा खूपच अवघड गोष्ट होऊन बसते.


सतराव्या शतकापर्यंत स्पिशीज हा शब्द फारच ढोबळमानानं वापरला जात होता,कोणत्याही प्राण्यांच्या किंवा वनस्पतींच्या वरवर सारख्या दिसणाऱ्या गटासाठी तो वापरला जायचा. १६८६ मध्ये जॉन रे यानं 'स्पिशीज' हा शब्द फक्त कोणत्याही सजीवाच्या एक आणि एकाच गटासाठी वापरला.आणि पाहता पाहता या शब्दाचं संकल्पनेत रूपांतर झालं.


जे सजीव आपापसातल्या समागमातून पुढची प्रजननक्षम प्रजा निर्माण करू शकतात,पण त्यांच्यातल्या त्यांच्यात थोडाफार फरक असू शकतो अशा सजीवांची एकच जात स्पिशीज म्हटली पाहिजे, अशी व्याख्या जॉन रे यानं मांडली.म्हणजे पिवळं फूल देणारी जास्वंद आणि लाल फूल देणारी जास्वंद ही दोन वेगळी झाडं दिसली तरी ते आपापसात प्रजनन करू शकतात आणि त्यांची स्पिशीज ही एकच आहे.


यानंतर कार्ल लिनियस यानं प्रत्येक जिवाला स्वतंत्र ओळख मिळावी या दृष्टीनं जीनस आणि स्पिशीज या दोघांचं मिळून त्या सजीवांना नाव देण्याची पद्धत निर्माण केली.पण या गोष्टीनं काही स्पिशीजची व्याख्या कशी करावी हा प्रश्न काही सुटला नाही हे मात्र खरं.


सजीवाच्या एका जातीतून दुसरी जात विकसित होत जाते ही स्पिशीज निर्माण होण्याची प्रक्रिया डार्विनच्या काळापर्यंत लक्षात आलेली नव्हती.त्यामुळे सगळ्या स्पिशीज या कधीही न बदलणाऱ्या स्वयंभू असतात असंच मानलं गेलं होतं.
त्यातून या प्रश्नाच्या उत्तराचा शोध घेताना माणसाला अनेक इतरही गोष्टी कळत गेल्या.


ख्रिस्तपूर्व चौथ्या शतकातल्या अ‍ॅरिस्टॉटलपासून एकविसाव्या शतकातल्या अनेकांनी या प्रश्नाचा मागोवा घेण्याचा प्रयत्न केला आहे.अ‍ॅरिस्टॉटलनं सारखी कार्य करणाऱ्या सजीवांना एका स्पिशीजमध्ये टाकलं.त्यानं यात सारखे गुणधर्म असलेल्या सजीवांना लक्षात घेतलं नव्हतं.

थोडक्यात,त्यानं सजीवांच्या सारख्या गुणधर्मांपेक्षा खाण्यायोग्य वनस्पती,पाळीव प्राणी अशा प्रकारे सारख्या प्रकारची उपयुक्तता किंवा कार्यं यांना विचारात घेतलं होतं.


१७३५ मध्ये लिनियसनं स्पिशीज स्वयंभू म्हणजे कधीही न बदलणाऱ्या असतात असं मानलं,पण त्यानंतर काहीच काळात त्याला त्यांच्यात हायब्रिडायझेशन शक्य आहे हे लक्षात आलं!आणि हायब्रिडायझेशनमधूनच नव्या स्पिशीजचा उगम होतो हेही त्याला कळलं.हीच गोष्ट पुढे चार्ल्स डार्विननं आपल्या 'ऑन द ओरिजिन ऑफ स्पिशीज'मध्ये मांडली.खूप काळ लोटल्यावर नव्या स्पिशीज कशा निर्माण होतात हे त्यानं सांगितलं होतं.पण मूळ स्पिशीजपासून दोन वेगळ्या स्पिशीज कशा निर्माण होतात हे डार्विननं सांगितलं नव्हतं.मूळ स्पिशीजपासून वेगळी स्पिशीज निर्माण होताना मधली कोणतीतरी ओळखू न येणारी स्थिती असेलच की.


पुढे १९२० आणि ३०च्या दशकात मेंडेलियन इनहेरिटन्स थिअरी आणि डार्विनची नॅचरल सिलेक्शन थिअरी एकत्र करून मॉडर्न सिंथेसिस नावाच्या नव्याच थिअरीचा पाया घातला. 


या थिअरीला कधीकधी निओ-डार्विनिझमही म्हणतात.त्यातून स्पिशीजच्या संकल्पनेला पुन्हा चालना मिळाली. या प्रक्रियेत एडवर्ड बॅग्नाल पोल्टन (Edward Bagnall Poulton) (१८५६ ते १९४३) यानं स्पिशीजच्या संकल्पनेत आणखी अनेक महत्त्वाचे मुद्दे घातले.तो डार्विनच्या नॅचरल सिलेक्शन थिअरीचा जोरदार पुरस्कार करायचा.डार्विनचं 'ओरिजिन ऑफ स्पिशीज' हे पुस्तक त्याला सगळ्यात महान पुस्तक वाटायचं.एकाच भौगोलिक ठिकाणी निर्माण झालेल्या नवीन स्पिशीजना त्यानं 'सिंपॅट्रिक' असं नाव दिलं


सजीव, अच्युत गोडबोले, अमृत देशपांडे, मधुश्री पब्लिकेशन


पुढे थिओडोशियस डोब्झान्स्की आणि अर्स्ट मेयर यांनी या संकल्पनेचा विस्तार केला. मेयर यानं तर आपल्या पुस्तकात जेव्हा एका स्पिशीजपासून दुसरी स्पिशीज वेगळी होते तेव्हा नव्या स्पिशीजमध्ये जनुकीय पातळीवर होणाऱ्या बदलांचं वर्णन केलं होतं.याला त्यानं 'रिप्रॉडक्टिव्ह आयसोलेशन' म्हटलं होतं.


यानंतर तर स्पिशीजच्या संकल्पनेला अनेकांनी हात घातला,पण याचा परिणाम स्पिशीज म्हणजे नेमकं काय,हा प्रश्न सोडवण्यापेक्षा त्या प्रश्नाचे वेगवेगळे पैलूच समोर येत राहिले.त्यापैकी काहींनी तर म्हटलं की स्पिशीजचा प्रश्न हा इतका गुंतागुंतीचा प्रश्न आहे,की तो जितका सोडवण्याचा प्रयत्न करू तितका त्यातला गुंता वाढत जाईल ! आतापर्यंत स्पिशीजची व्याख्या करताना अनेकांनी अनेक विधानं केलेली आहेत.त्यातली काही अशी :


बायॉलॉजीमध्ये स्पिशीज या संकल्पनेइतकी अवघड संकल्पना कोणतीच नाही.आणि या संकल्पना विशद करताना वैज्ञानिकांत कधी नव्हे इतकी वेगवेगळी मतं आहेत. - निकोल्सन १८७२. ("No term is more difficult to define than 'species,' and on no point are zoologists more divided than as to what should be understood by this word." - Nicholson 1872).


एखादी स्पिशीज वेगळी ओळखू आल्यानंतर,स्पिशीज या संकल्पनेची वैश्विक व्याख्या करणं सोपं जाईल,पण आधी स्पिशीज वेगळी ओळखता येणं गरजेचंच आहे.थोडक्यात,हे दोन एकमेकांवर अवलंबून असलेले प्रश्न आहेत ! - डोब्झान्स्की (१९३७)


स्पिशीजच्या व्याख्येच्या यशातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे,की वस्तुस्थिती काय आहे यापेक्षा आपण त्यातले हायपोथिसिस किती व्यवस्थित मांडू शकतो यावर त्या व्याख्येचं यश अवलंबून आहे. - ब्लाँड (१९७७)


स्पिशीजची व्याख्या करण्याचा प्रयत्न करणं हे बायॉलॉजिस्ट्सचं फार जुन्या काळापासून चालत आलेलं अपयश आहे. हे २००१ मध्ये केलं गेलेलं विधान आहे.


या सगळ्यावरून आपल्याला एकच गोष्ट कळते.ती म्हणजे स्पिशीज ही सेक्शुअल रिप्रॉडक्शननं सतत बदलत जाणारी प्रवाही गोष्ट आहे.शेवटी स्पिशीज या गोष्टीची व्याख्या करणं म्हणजे नदीच्या प्रवाहासोबत वाहणाऱ्या पाण्याच्या एका रेणूचा पाठलाग करण्यासारखंच हे आहे!

१६/५/२५

पळस गाणारं झाडं / The tree that sings the song

पळसाचं झाड माझं लक्ष वेधतं ते चैत्रात.सारा वृक्ष लाल फुलांनी बहरून जातो.झाड पर्णहीन होतं. साऱ्या झाडावर फुलंच फुलं दिसतात.वाटतं रंगाचं सरोवर आपण पाहात आहोत.रामायणात प्रभू रामचंद्र विंध्य पर्वताच्या पायथ्याजवळ आल्यावर सीतेला म्हणतात-


'आदीप्तानिव वैदेहि सर्वतः पुष्पितान्नगान् । 

स्वैः पुष्पैः किंशुकान्पश्य मालिनः शिशिरात्यये ।।" 


सीते ! बघ,वसंत ऋतूत पळस जणू फुलांच्या माळा ल्याला आहे. फुललेला पळस पाहून वाटतं की, जणू तो आगीनं जळत आहे.


पळसाच्या लाकडात सुप्त अग्नी असतो.प्राचीन काळी यज्ञासाठी अग्नी प्रज्वलित करण्याकरिता पळसाच्या लाकडाचा उपयोग केला जाई.जणू वसंतात हा सुप्त अग्नी फुलांच्या रूपानं बाहेर पडतो.साहेबानं यालाच 'फ्लेम ऑफ फॉरेस्ट' म्हटलं.तेवढं आपल्या लक्षात राहिलं. साहेबांच्या देशात पळसाचं झाड नाहीच.त्यातील मूळ कल्पना संस्कृतातूनच घेतली आहे.


एरवी पळसाच्या झाडाइतकं अनाकर्षक जंगलात काहीच नसावं.आंबा व मोहाचा आकार डेरेदार असतो.तसा प्रत्येक वृक्ष बीजातूनच आकार घेऊन जन्माला येतो.पण पळसाचं झाड मात्र आकारहीन असतं.वनातील जमीन निकस व्हायला लागली की पळसाचं प्रमाण वाढू लागतं.गुरंढोरं,शेळ्यामेंढ्या पळसाच्या पानाला तोंड लावीत नाहीत.त्या निकृष्ट जमिनीत ती वाढू लागतात.पळस निकृष्ट जमिनीचं प्रतीक आहे.कुवार व चिरपल्लवी जंगलात तुम्हाला पळसाचं झाड दिसणार नाही.पळसाला जसा आकार नाही तसाच त्याच्या सुंदर फुलांना गंधही नाही.फुलांचा बहर संपू लागताच त्याला कोवळी पालवी फुटते.ती पाने मुंगसाच्या कानासारखी लालसर दिसतात.


पण फुललेला पळस मला आवडतो तो वेगळ्याच कारणाकरिता.पळस फुलला की गुलाबी रंगाच्या पळसमैना-रोझी पॅस्टर-यांचे थवेच्या थवे युरोप, आशिया,मध्यपूर्व प्रदेश,

तुर्कस्थान ह्या भागातून भारतातील पळसाच्या जंगलात येतात.आभाळात त्यांचे थवे पाहिले की वाटतं ढग आले आहेत.प्रचंड किलकिलाट करीत ते फुललेल्या पळसावर उतरू लागतात.पळसाच्या फुलांत भरपूर मध असतो.तो ते प्राशन करीत असतात.पळस-मैना पळसात परपरागन आणि परफलन घडविण्याला फार साहाय्य करतात.पक्षिनिरीक्षणाचे पहिले धडे फुललेला पळस देतो.पोपट,पाणपोपट,हळदू, कोतवाल,भृंगराज,साळुंकी,मैना,बुलबुल आणि सूर्यपक्षी असे अनेक प्रकारचे पक्षी मधासाठी येत असतात.सर्वांनाच मध हवा असतोच असं नाही. काही त्या फुलांतील कीटकांसाठी येतात.तो फुलांनी बहरलेला वृक्ष मधमाश्यांच्या गुंजारवानं निनादित होतो.तो अनाकर्षक वृक्ष फुलांवरील पक्षी व मधमाश्यांच्या आवाजानं जणू गाऊ गुणगुणू लागतो.ते झाड गाणारं झाड होतं.


आपल्या आयुष्यात कुणी पळसाचं झाड लावलं अन् त्यानं त्या झाडाची फुलं पाहिली असं सहसा घडत नाही.त्याचं कारण पळसाचं झाड फार हळूहळू वाढतं.वर्षानुवर्षं ते वनवणव्यात जगत-मरत असतं.जमिनीत मुळाचा कंद होत असतो.हा कंदच पुढं आनंदकंद होऊन फुलांनी बहरून आनंद देतो. कुणी तो आवडीनं घराच्या बागेत लावत नाही.पण परवा सर एडविन ऑर्नल्डचं 'दि लाइट ऑफ एशिया' हे बुद्धाचं चरित्र वाचताना मध्येच थांबलो. सिद्धार्थाची आई मायादेवी आपल्या राजवाड्याच्या उद्यानातील पळसाच्या वृक्षाखाली नित्य बसत असल्याचा उल्लेख आहे.मला पळसाविषयीची सप्तशतीतील सुंदर गाथा आठवली. " पोपटाच्या चोचीप्रमाणं लालभडक अशा पळस-पुष्पांनी पृथ्वी शोभायमान झालेली आहे. जणू बुद्धाच्या चरणाशी वंदन करण्यासाठी लोटांगण घालणाऱ्या भिक्षुसंघाप्रमाणं हे दृश्य दिसत आहे."


पळसाची लाल नारिंगी फुलं पोपटाच्या चोचीसारखी दिसतात.म्हणून पोपटाला किंशुक हे वैकल्पिक नाव आहे.

नवेगाव तळ्याकाठच्या जंगलात पिवळ्या फुलांचा पळस पाहिला,तसा पांढऱ्या फुलांचाही.हा पिवळा व पांढरा पळस फुलला की जपानी लोक चेरीची फुलं पाहायला जावेत तसा मी मुद्दाम तो फुलोरा पाहायला जात असे.आपल्याकडे अशी फुलं पाहायला जायची आवड कमी.


आपल्या संस्कृत व प्राकृत वाङ्मयात वसंतोत्सवाची विपुल वर्णनं आहेत.त्यावरून आपल्या प्राचीन जीवनातल्या निसर्गप्रेमाची साक्ष आपणाला मिळते. 


पण ही निसर्गपूजा जीवनातून नष्ट होऊन ग्रंथात जाऊन बसली आहे.ह्या उलट जपानमध्ये घडलं. त्यांनी निसर्गाचं हे वातावरण जीवनात आणलं आहे.नाही तर चेरीत व पळसात काय फरक आहे ? चेरीच्या फुलोऱ्याचे पंधरा-वीस दिवस सोडले तर इतर वेळी या झाडाचं रूप पळसासारखंच अनाकर्षक असतं.चेरीच्या मोहराला जपान्यांनी जागतिक माहात्म्य मिळवून दिलं.चेरीवर शेकडो लक्षावधी हायकू लिहिण्यात आल्या.चेरीचा मोहर पाहायला जगातील निसर्गप्रेमी जपानला जातात.


तुम्ही पळसवनात गेलात की पळसाखाली केसरी रंगाच्या फुलांचा सडा पडलेला असतो. कांचनमृगाला पळसाची फुलं खायला फार आवडतात.गाथा सप्तशतीत एक बहारीचं वर्णन आहे.


" रानात जागोजागी पेटलेल्या वणव्याच्या लाल ज्वालांच्या ओळींनी वनप्रदेशात प्रकाशित झालेली झाडं पाहून अज्ञ कांचनमृगाला ती फुलांनी बहरलेली पळसाची झाडंच वाटली.म्हणून बिचारा कांचनमृग अरण्यातून बाहेर पडलाच नाही." कोवळ्या पानाबरोबर लवकरच पळसाला चापट तांबड्या रंगाच्या शेंगा धरू लागतात.त्यांना पळसपापडी म्हणतात.वाटतं की झाड पुन्हा वेगळ्याच पानांनी बहरलं आहे.पळसपापडी इतकी हलकी असते की वाऱ्याच्या प्रत्येक झुळकीबरोबर रुणुझुणु वाजू लागते.ती वाऱ्यानं सहज दूरवर विखुरली जाते.


'पळसाला पानं तीनच' ही म्हण मी अनेकदा वाचली आहे.पण तिचा अर्थ जाणवला तो कै. धनुर्धारीलिखित 'वाईकर भटजी' ही कादंबरी वाचताना.१८९७ साली लिहिलेली ही कादंबरी वाचताना गोल्डस्मिथच्या 'दि व्हिकर ऑफ वेकफिल्ड'ची आठवण होते.


खूप वर्षांपूर्वी मी पळसावर एक कथा लिहिली होती.


"त्या माळरानातून तो बौद्ध भिक्षु रोज भिक्षेसाठी गावात जाई.तो एक महान शिल्पकार होता. माळरानातून जात असता समोरच्या डोंगरमाथ्यावर पळसाचं वन होतं.

पळसाच्या तीन बहिणी हातात हात घालून वाऱ्याबरोबर नृत्य करू लागल्या की तो कलाकार त्यांच्याकडे कौतुकानं पाहात पुढं निघून गेला की त्या खुदकन् हसत.तीन बहिणींचे ते मधुर स्मित त्याच्या मनातच राही.


गावात एका वेश्येच्या दारात उभा राहून त्यानं भिक्षा मागितली.मोत्याचा शुभ्र हार तिनं त्याला स्वागतार्थ प्रदान केला.तो तिला म्हणाला,'नको.मला पळसाच्या द्रोणात पाणी हवंय.बुद्धदेवांच्या चरणांवर वाहण्यासाठी.'


फार वर्षांपूर्वी मी नांदेड जिल्ह्यातील पैनगंगेकाठच्या सहस्रकुंडाला होतो.नदीच्या काठचा प्रदेश सपाट व विस्तृत.या घनदाट झाडीत वसंत आला की त्यातील पळसवनाला फुलांचा बहार येई.


जंगलांचे देणे,मारुती चितमपल्ली,साहित्य प्रसार केंद्र, सीताबर्डी,नागपूर


जंगलात ठिकठिकाणी मथुरा लमाणांचे तांडे होते. त्यांचा मुख्य धंदा गाई पाळण्याचा.मथुरा लमाणांच्या स्त्रिया दिसायला फार सुंदर असतात.राधेच्या कुळातील म्हणून की काय !


ऐन दुपार झालेली.वृक्षाच्या छाया देखील तळाशी लपलेल्या.

आमची बैलगाडी अशाच एखाद्या तांड्याजवळ आलेली.

ओढ्यातील खडकावर बसून न्हात असलेल्या स्त्रिया दुरून दिसायच्या.गाडीच्या धावांच्या खडखडाटाचा आवाज कानी पडताच त्या तरुणी एखाद्या सुसरीप्रमाणं चपळतेनं पाण्यात शिरायच्या.सुंदर चेहरा,डोक्यावर केसांचा उंच खोपा.

लज्जावनत सुंदर चेहऱ्याचं प्रतिबिंब पाण्यात पडलेलं.म्हणून गाथा सप्तशतीकारानं तरुणांना सावधगिरीची सूचना दिलीय. "पळसाच्या फांद्यांवर पिवळसर तांबडी फुलं डवरली आहेत.मुला,या बहरात वसंताचे सामर्थ्य दिसत असल्यामुळे लोकांना त्याची भीती वाटते."


होळी जवळ आलेली.पळसाच्या लाखेपासून तयार केलेल्या रंगीत रोंगणाने त्या तरुणी आपल्या लांबसडक बोटांची नखं रंगवायच्या.पळसाच्या फुलापासून पिवळाधमक रंग तयार करून वनाधिकाऱ्याची त्या वाट पाहात असायच्या. वनाधिकारी म्हणजे त्या भागातील सर्वात मोठा अंमलदार.मी अनेकदा त्या रंगात न्हालोय.सुटका व्हायची ती भरपूर बक्षीस दिल्यावरच.आता ह्या गोष्टीला अनेक वर्षं झालीत.पण असा वसंत आला की वरील साऱ्या प्रसंगाची आठवण होते.त्या वेळी मी बावरून जाई.आता त्याचे विलासविभ्रम आठवतात.त्यांचं जाणीवपूर्वक स्पर्शसंक्रमण आठवतं.

गुलालानं भरलेले त्यांचे गोरे चेहरे आठवतात.'पाठ असलेल्या एखाद्या कवितेचा गर्भित अर्थ लागावा पण खूप विलंबानं तसा...'

१४/५/२५

गेल्यानंतरचा सोहळा / The ceremony after leaving.

जगण्या आणि जगवण्याच्या लढाईमध्ये आज पर्यंत माझे सहा एक्सीडेंट झाले आहेत... 


जीव वाचला;परंतु कमरेच्या मणक्यात आणि मानेच्या मणक्यात सहा गॅप आहेत... ! 


मध्ये मध्ये ही दुखणी लहान बाळासारखी रडायला लागतात, परंतु जो जो रे बाळा जो म्हणत,मी त्यांना मनातल्या मनात बऱ्याच वेळा झोपवतो... ! 


परंतु थंडीच्या दिवसांमध्ये हाडांची हि काही दुखणी स्वतःही झोपत नाहीत आणि मलाही झोपू देत नाहीत... 


डाव्या हातात मुंग्या येतात....मानेपासून डावा हात इतका दुखतो;की डोळ्यातून पाणी आल्याशिवाय राहत नाही.... ! 


या त्रासामुळे मोटरसायकल चालवताच येत नाही....  


आणि त्यामुळे बऱ्याच वेळा फिल्डवर, भिक्षेकर्‍यांमध्ये जाणे मनाविरुद्ध रद्द करावे लागते.... ! 


मागील महिन्यात दोन-तीन सुट्ट्या अशाच मनाविरुद्ध पडल्या... 


तिथल्या आज्यांना औषधे देता आली नाहीत हि एक तळमळ... आणि जीव घेण्या पद्धतीने डावा हात दुखतोय ही दुसरी तळमळ... 


दुहेरी कात्रीत मी सापडलो होतो. 


आज सोमवारी १६ तारखेला मात्र गेलो... 


मला काय त्रास होतो आहे,याची अर्थातच त्यांना कल्पना नव्हती.... ! 


खूप दिवसातून मी त्यांना भेटत होतो.... 


मला बघितल्यावर मग,हात वारे करून माझ्याशी त्या हक्काने कचकचून भांडायला लागल्या...! 


आमी काय मरायचं का ? तू काय सोताच्या मनाचा मालक हाय का ? तुला काय लाज हाय का ? वगैरे वगैरे...


शंभर गोष्टी त्यांनी मला सुनावल्या... ! 


माझा डावा हात अजूनही नीट उचलत नाही.... तरीही मी मोटरसायकल चालवत गेलो होतो.... ! 


उजवा हात माझ्या डाव्या छातीवर ठेवून, अभिवादन करून,मी त्यांना समजेल अशा भाषेत सांगितलं,'माज्या मानंच्या मणक्यामदल्या शिरा चीमटल्या हायेत... माजा डावा हात नीट काम करत न्हायी... तरीबी तुमच्यासाठी गाडी चालवून हितपर्यंत आलो... फकस्त तुमच्यासाटी... ! 

आणि तुमि माज्याशी भांडायला लागला...' मी काकुळतीने बोललो... ! 


हि वस्तुस्थिती ऐकल्यानंतर त्यांचा चेहरा मात्र लगेच बदलला...  


श्रावणात उन्हं असताना पाऊस पडतो आणि पाऊस पडताना लगेच उन्हं पडतात...


माझ्या बोलण्यानंतर,रागे भरलेल्या डोळ्यांमध्ये आता पाऊस साठला होता...


क्षणात मोसम बदलला होता...! 


श्रावणाचा महिना नसताना सुद्धा,भर थंडीतही, मावश्यांच्या डोळ्यातल्या अश्रूंचा पाऊस माझ्या खांद्यावर पडला... ! 


एकीने खांदा चोळला ... 

एकीने डावा हात हातात घेऊन त्याला मालिश केले... 

एकीने डोक्यावर हात ठेवून आला-बला काढली... ! 


साधा भीक मागणाऱ्या लोकांचा डॉक्टर मी... पण माझ्या लोकांनी आज मला एखादा राजकुमार असल्याचा फील दिला.... ! 


मी आपला सहज बोलून गेलो,'एक महिना नाही आलो तर इतकं बोलता... मी जर मेलो बिलो आणि कधी आलोच नाही तर काय कराल ?'


या वाक्याने त्यांचा बांध फुटला... 


श्रावणाने पुन्हा मौसम बदलला...! 


एक रडायला लागली,डॉक्टरला मरू नको देऊ म्हणून तिने मंदिरापुढे अश्रूंचा अभिषेक केला...


एकीने रडत देवाला कौल लावला ...  


एक आजी रडत देवाशी चक्क भांडायला लागली, "डाक्टरच्या" मणक्यात गॅप दिल्याबद्दल ती त्याला दोष देत होती.... ! 


मी भारावून गेलो...  माझ्या डोळ्यात पाणी आलं...! 


मला खूप पूर्वी वाटायचं,आपण मेल्यावर आपल्यासाठी कोणी मनापासुन रडेल का ? 


आपण मेल्यावर आपल्यासाठी कोण कोण रडतं ? हे पाहायची काही सोय आहे का ? 


आता,हा प्रसंग पाहिल्यानंतर,माझ्या मृत्यू मागे कोण कोण रडणार याची नोंद माझ्या मनात झाली होती... !


मेल्यावर माझ्या माघारी रडणारी माणसं,आज मी माझ्या जिवंतपणे पाहिली.... ! 


पण जाणीव झाली,आपण मेल्यावर आपल्या मागं ज्यांनं रडावं,असं आपल्याला वाटत असेल,त्याला आपल्या जिवंतपणी हसवावं लागतं...!* 


It's damn reality.... !!!


असो...


मी माझ्या व्याख्यानात नेहमी म्हणतो.... आपल्याला जेव्हा काहीतरी दुखतं खुपत् त्यावेळी आपल्या वेदना होतात आणि आपल्या डोळ्यातून पाणी येतं .... 


परंतु जेव्हा दुसऱ्याला वेदना होतात आणि तरीही आपल्या डोळ्यात पाणी येतं...त्याला संवेदना म्हणतात ... समवेदना म्हणतात.... ! 


या माझ्या आज्या - मावश्या आज माझ्यासाठी रडल्या...  यात मला आनंद नाही...


माझी वेदना; त्यांनी संवेदना आणि समवेदना म्हणून स्वीकारली... यात आनंद आहे ! 


वेदनेपासून संवेदनेकडचा आणि समवेदनेकडचा प्रवास त्यांचा सुरु झाला आहे यात मी सुखी आहे.... ! 


आता मी कधीही गेलो तरी सुद्धा,आज्यांच्या प्रार्थनेच्या हातात मी जिवंत असेन;याची मला जाणीव आहे.... 


आता माझ्या मागे कोण कोण रडेल याची मला फिकीर नाही.... !


माझ्या जाण्यानंतरचा सोहळा आज मी जिवंतपणे पाहिला...!!! 


१६ डिसेंबर २०२४


डॉ.अभिजीत सोनवणे,डॉक्टर फॉर बेगर्स


शब्दकोड्यातील एका शब्दाची माहिती..


मॅग्नस परिणाम :आपण पाहतो,की फुटबॉल खेळात बऱ्याच अंतरावरून गोल करण्याच्या तयारीत असलेला खेळाडू पायाने चेंडू अशा तऱ्हेने मारतो,की आपल्याला वाटते कुठेतरी वेगळ्याच दिशेला मारलाय,आणि आता गोल होणार नाही.पण तो स्वत:भोवती गरगरत जाणारा चेंडू हवेतून जाताना आपली दिशा बदलत राहतो आणि थेट जाळीत जाऊन धडकतो.या द्रायूमधून (फ्लुइड,इथे हवा हे माध्यम) स्वत:भोवती फिरत जाणाऱ्या गोलकांच्या दिशा बदलत राहण्याच्या क्रियेला 'मॅग्नस परिणाम' म्हणतात.हे नाव एच.जी.मॅग्नस या जर्मन शास्त्रज्ञाच्या नावावरून देण्यात आले आहे.हा परिणाम क्रिकेट,टेनिस अशा खेळांतील चेंडूंच्या बाबतीतही होताना दिसतो.या परिणामाचा उपयोग मार्गदर्शित क्षेपणास्त्र (गाइडेड मिसाइल) आपल्या लक्ष्यावर अचूक पोहोचावे म्हणूनही केला जातो.


या परिणामाचे तत्त्व पुढीलप्रमाणे आहे,स्वतःभोवती फिरणारी वस्तू माध्यमाचा पातळसा थर घेऊन फिरते.वस्तू पुढे जाताना माध्यमातून मार्ग कापावा लागतो,त्या वेळी सुटे माध्यम आणि वस्तूला चिकटून फिरणाऱ्या थरामध्ये घर्षण होते.एका बाजूला फिरण्याची दिशा आणि पुढे जाण्याची दिशा एकच असते.सुटे माध्यम आणि फिरणारा थर एकाच दिशेने जात असल्याने त्या बाजूच्या माध्यमाचा वस्तू पार करण्याचा वेग वाढतो.याउलट,

वस्तूच्या विरुद्ध बाजूला सुटे माध्यम आणि फिरणारा थर यांची दिशा एकमेकांविरुद्ध असते,ते एकमेकांना विरोध करतात आणि त्यामुळे त्या बाजूच्या माध्यमाचा वस्तू पार करण्याचा वेग कमी होतो.ज्या बाजूला वेग कमी असतो,त्या बाजूला माध्यमाचा दाब वाढतो,विरुद्ध बाजूला माध्यमाचा दाब कमी होतो आणि वस्तूवर कमी दाबाच्या दिशेला बल कार्य करते.या बलामुळे ही द्रायूमधून स्वत:भोवती फिरत जाणारी वस्तू सतत आपला मार्ग बदलत राहते.


मराठी विज्ञान परिषद पत्रिका 

जानेवारी २०२३




१२/५/२५

ख्रिश्चन असलेला कॉन्स्टंटाइन /Constantine,a Christian 

मार्कस ऑरोलियसचा मुलगा कॉम्पोडस हा नीरो वगळल्यास इतर सर्व सम्राटांत अत्यंत दुष्ट व रानटी सम्राट होऊन गेला.पुढील तीनशे वर्षांतल्या सम्राटांचा इतिहास थोडक्यात सांगायचा,तर असे म्हणता येईल की,त्यांनी खून केले,कत्तली केल्या,जुलूम केले व शेवटी त्यांचेही खून झाले ! त्यांच्या दुष्कृत्यांचा इतिहास सांगत बसण्यात फारसा अर्थ नाही.तो म्हणजे कंटाळवाणी व वीट आणणारी मूर्खपणाची कथाच आहे.नावे व तारखा बदलल्या की सर्व प्रकार तेच !


 मार्कस ऑरेलियस मागून झालेल्या अनेक सम्राटांपैकी कॉन्स्टंटाइन तेवढाच इतरांहून वेगळा आढळतो;पण तो इतरांपेक्षा अधिक चांगला म्हणून नव्हे तर त्याने ख्रिश्चन धर्म हा राज्याचा राष्ट्राचा धर्म केला म्हणून.तथापि,कॉन्स्टंटाइनचा ख्रिश्चन धर्म ख्रिस्ताच्या धर्माहून वेगळा होता.


कॉन्स्टंटाईन इ.स.३१३ या वर्षी गादीवर आला.इतर साऱ्या उमेदवारांस ठार करूनच नेहमीच्या पद्धतीप्रमाणे तो गादीवर आला.त्याचा बाप कॉन्स्टंटियस हा डायोक्लेशियन सम्राटांच्या कारकिर्दीत गव्हर्नर होता. त्याची आई हेलेना ही एका खानावळवाल्याची ख्रिश्चन कन्या पित्याची महत्त्वाकांक्षा त्याच्या रक्तात उतरली होती व ती पुरी करण्यासाठी त्याने तिचा धर्म पत्करला. 


गादीसाठी असलेल्या प्रतिस्पर्ध्यातल्या मॅक्झेन्टियसशी लढताना त्याला यश येईना.त्याने साऱ्या जुन्या देवदेवतांना प्रार्थिले,पण सर्वच दुसऱ्या कुठल्यातरी भानगडीत गुंतलेले असल्यामुळे कोणीच मदतीस येईना. त्याचा पराभव होऊ लागला.शेवटी हताश होऊन त्याने आपल्या आईच्या 'येशू' देवाची प्रार्थना केली;त्याला विजय मिळाला.तो नव्या देवाला केलेल्या प्रार्थनेमुळे मिळाला,असे त्याला वाटल्यामुळे त्याने शांततेचा धर्म देणाऱ्या येशूला रोमन साम्राज्याची 'युद्ध-देवता' बनविले.भोळसट रोमनांना युद्धात खरोखर ख्रिस्तानेच मदत केली हे पटवून देण्यासाठी त्याने एक चमत्कार-कथा रचली "मॅक्झेन्टियसवर चाल करून जाताना मला 'या चिन्हाच्या योगेच तुझा जय होईल' असे शब्द वर असलेला एक जळजळीत क्रॉस दिसला."


या नवीन ख्रिश्चन युद्धदेवतेमुळे कॉन्स्टंटाइनला इतका आनंद झाला की,त्याने ख्रिश्चन धर्म रोमचा राष्ट्रधर्म केला.तोपर्यंत ख्रिश्चन धर्म शांतिप्रियांचा होता,प्रतिकार न करणाऱ्यांचा होता.


पण आता तो अहंमन्यतेने व गर्वाने लढणाऱ्या लोकांचा चढाऊ धर्म झाला." रोमन सैनिकांनो,पुढे चला ' या युद्धघोषणेऐवजी " ख्रिश्चन सैनिकांनो,पुढे चला " अशी रोमची नवी युद्धघोषणा बनविण्यात आली व त्या सैन्याच्या पुढे,पाठीवर जड क्रॉस असलेला गॅलिलीचा तो थकलेला ज्यू मिरविण्यात येऊ लागला.


ख्रिश्चन धर्म अंगीकारून अगर त्याला चुकीने जो ख्रिश्चन धर्म वाटला तो घेऊन व रोमचा तो राष्ट्रधर्म करून कॉन्स्टंटाईनने आपल्या पत्नीचा,वडील मुलाचा व एका पुतण्याचा खून केला व रोमवर अनियंत्रित राजसत्ता गाजविण्यास सुरुवात केली.

त्याच्यापूर्वी डायोक्लिशन अंगावर रेशमी कपडे घाली,हाती राजदंड व डोक्यावर पर्शियन सम्राटांचा मुकुट धारण करी.पण कॉन्स्टंटाइन त्याच्याही पुढे जाऊन आपल्या राष्ट्राच्या भवितव्याचा एकमेव विधाता बनला.त्याने सीनेटची सर्व सत्ता संपुष्टात आणली,पर्शियन सम्राटांप्रमाणे निरनिराळे मंत्री व अधिकारी निर्माण केले,

चॅन्सेलर,खजिनदार, शरीररक्षक,दलांचे सेनापती,वगैरे पदाधिकारी नेमले. नाना रंगांचे व सोनेरी पदरांचे झगे तो अंगावर घाली. त्याच्या भेटीस येणाऱ्यांना त्याला साष्टांग प्रणिपात करावा लागे.

बॉस्फरसच्या सामुद्रधुनीवर वायझटियम शहर पुन्हा बांधून त्याने त्याला 'कॉन्स्टँटिनोपल' (म्हणजे कॉन्स्टाइनचे शहर) असे नाव दिले.आशियातील राजेमहाराजांप्रमाणे भव्य-दिव्य वैभवात राहू पाहणाऱ्या रोमन सम्राटांच्या निवासासाठी हे शहर बांधण्यात आलेत्याने सुरू केलेल्या या नव्या अनियंत्रित सुलतानशाहीचा थाटमाट टिकविण्यासाठी त्याने आधीच जबर असलेले कर वाढविलेपुष्कळशा रोमन नागरिकांस त्याने केवळ गुलाम केले.रोमन सुलतानांमध्ये तो सर्वांत निरंकुश होता.अर्वाचीन काळातील सारे झार व कैंसर यांची अवलाद त्याच्याचपासून सुरू झाली.


'रोमन इतिहासाची रूपरेषा' या आपल्या पुस्तकात प्रो.मॉर लिहितो,"अर्वाचीन युरोपातील साम्राज्यात ऑगस्टसचा तो पहिला साम्राज्यवाद नसून नंतरचा कॉन्स्टंटाइनचा साम्राज्यवाद आहे.तो पुन्हा प्रकट झाला आहे."


निकाई येथे ख्रिश्चन धर्मोपदेशकांचे संमेलन भरविल्याबद्दल कॉन्स्टंटाइन विशेष प्रसिद्ध आहे.इ.स. ३२५ मध्ये हे संमेलन भरले होते.ख्रिस्ताच्या दैवी विभूतिमत्त्वाबाबतच्या नाना मतांच्या चर्चेसाठी कॉन्स्टेंटिनोपलनजीकच्या नाइस शहरी ही धर्मपरिषद भरली होती.आजच्या प्रमाणेच कॉन्स्टंटाइनच्याही काळात मॉडर्निस्ट,फंडामेंटलिस्ट,पुराणमतवादी, नवमतवादी असे नाना विरोधी संप्रदाय होते व ते परस्परांचे गळे कापण्यास सदैव सज्ज असत.


नाइस येथे भरलेल्या धर्मपरिषदेकडे आपण आता जरा नजर फेकू या.


नाइस येथे भरलेल्या परिषदेतील नवमतवाद्यांना एरिएन म्हणत;

कारण ते रियसचे अनुयायी होते.आजच्या युनिटेरियन मताशी या एरियन पंथाचे सादृश्य होते.अ‍ॅरियस म्हणे," ख्रिस्त ही पवित्रांहून पवित्र व थोरांहून थोर विभूती होय.पण तो कितीही थोर असला, तरी काही देव नव्हे." याउलट फंडामेटॅलिस्ट, पुराणमतवादी किंवा सनातनी होते.ते म्हणत,"ख्रिस्तामध्ये ईश्वर,त्याचा पुत्र व पवित्र आत्मा असे तीन अंश आहेत.पिता + पुत्र + पवित्र आत्मा अशा विविध स्वरूपांची एक मूर्ती म्हणजे ख्रिस्त." हे मतभेद मिटविण्यासाठी भरविलेल्या त्या संमेलनाला सुमारे अडीच हजार धर्मभिक्षू व तीनशे अठरा बिशप हजर होते.त्यांना कॉन्स्टंटाइनने आपापले म्हणणे आपल्यासमक्ष मांडण्यास सांगितले.ही चर्चा ग्रीक भाषेतून चाले.कॉन्स्टटाइनला ग्रीक बोलता येत नसे व समजतही नसे.पण या चर्चतला एक विशिष्ट भाग मात्र त्याला सहज समजला.तो म्हणजे,सनातन्यांपैकी एकाने वादाच्या भरात ऑरियसवर केलेला प्रहार हा मुद्दा त्याला अगदी स्पष्टपणे कळला.त्याला त्यातील तर्कशुद्धता,तद्वतच सरळपणा नीट पटला !


कॉन्स्टंटाइन : जुन्या धर्मवृत्तीचा आत्मा असलेला ख्रिश्चन,मानव जातीची कथा,हेन्री थॉमस,अनुवाद-साने गुरुजी,मधुश्री पब्लिकेशन


चर्चा दोन महिने चालली.सनातन्यांचा आवेश,त्यांची मारामारी वगैरे पाहून त्यांचे म्हणणे बरोबर असा कॉन्स्टंटाइनने निकाल दिला.

विविध तत्त्वांवर विश्वास न ठेवणाऱ्यांना त्याने हद्दपार केले व रियसची पुस्तके होळीत टाकली.रियसचे पुस्तक कोणाजवळ आढळले, तर त्याला ठार मारण्यात येईल असे फर्मान त्याने काढले.


नंतर रोमन साम्राज्याच्या धर्तीवर चर्चची संघटना करण्यासाठी त्याने मदत केली.बिशप चर्चचे गव्हर्नर झाले.बिशप निवडून येण्यासाठी रोमन निवडणुकीतल्याप्रमाणे अन्-ख्रिश्चन प्रचार होऊ लागले.गिबन म्हणतो, "बिशप पदासाठी उभे राहणाऱ्या एकाने आपण उच्च कुळातले असल्याचे प्रौढी मारली;तर दुसऱ्या एकाने भरपूर खाना देऊन आपणासच निवडण्यात यावे यासाठी खटपट केली.तिसऱ्या एकाने तर याहीपुढे जाऊन चर्चमध्ये होणारी प्राप्ती देण्याचे,तीत वाटेकरी करण्याचे निवडून देणारांस आश्वासन दिले."आतापर्यंत बिशपची जागा सेवेची होती.नम्र व अधिक सेवा करणारा बिशप बने.पण आता ती अपवित्र डामडौल,अहंकार,

जुलूम व स्वार्थ यांची जागा झाली.धर्मपदावर आता नवीनच नमुन्याचे लोक येऊ लागले.या धर्मवीरांना कोर्टात बोलावणे येई,ते राजदरबारातील खान्यास जात, सम्राटाबरोबर युद्धातही जात.

थोडक्यात सांगायचे,तर ख्रिश्चन धर्मातील नम्रता गेली.ख्रिश्चन धर्म सत्तारूढ व संपन्न झाला,प्रतिष्ठित झाला,दूषित व अधः पतित झाला.पोप हा चर्चचा पिता.पोप या शब्दाचाच अर्थ पिता.रोमन साम्राज्यातील जनतेच्या मनोबुद्धीवर पोप निरंकुश सत्ता चालवी.ख्रिस्ताच्या नव्या राज्याचे तीन भाग झाले;स्वर्गाचे राज्य,रोमचे राज्य व चर्चचे राज्य. 


नाझरेथ येथील तिरस्कृत परिव्राजकाच्या येशूच्या - साध्या,

सुंदर व मधुर धर्माच्या लोकशाही पुरस्कर्त्या व समतेच्या शिकवणीपासून नवीन प्रतिष्ठित ख्रिश्चन धर्म कितीतरी लांब गेला ! 


कॉस्टंटाइनने ख्रिश्चन धर्म स्वीकारला व तो राष्ट्राचा धर्म केला,तेव्हा रोमन साम्राज्यात जवळजवळ साठ लक्ष ख्रिश्चन होते.पण ख्रिश्चन धर्म राष्ट्रधर्म झाल्यावर त्याच्या अनुयायांची संख्या तलवारीच्या योगाने वाढू लागली. जगाचा बराचसा भाग ख्रिश्चन झाला रक्ताचा बाप्तिस्मा दिला गेला,पश्चिमेचा प्रभावी धर्म म्हणून ख्रिश्चन धर्म सर्वत्र ओळखला जाऊ लागला.पण तो प्रभावी झाला तरी ख्रिस्ताचा मूळचा सुंदर शिवधर्म मात्र राहिला नाही.


मृत्यूशय्येवर असताना कॉन्स्टंस्टाइनला बाप्तिस्मा दिला गेला.चर्चच्या प्रेमळ बाहूत असताना मरण आले तर केलेल्या सर्व पापापासून मुक्ती मिळेल,असे त्याला वाटले.तो मरताना चौसष्ट वर्षांचा होता.त्याने चोवीस वर्षे राज्य केले. इ.स. ३३७मध्ये तो मरण पावला.


सर्व रोमन सम्राटांपेक्षा कॉन्स्टंटाइन अधिक अवडंबर माजविणारा होता.त्याचा थाटमाट अपूर्व असे.त्याची कारकीर्द रानवट वैभवाने भरलेली आहे.पण ती मृत्यूच्या वादळाची भव्यता होती.रोमची शक्ती क्षय पावू लागली होती.कृष्ण पक्ष सुरू झाला होता.ओहोटी लागली होती. उत्तमोत्तम तरुण मारले गेले होते.प्लेगाच्या साथीमुळेही लोकसंख्या खूप घटली.युद्धामुळेच प्लेग सर्वत्र साम्राज्यभर पसरला.रोमनांनी सर्वत्र पेरलेल्या रक्तपाताच्या बीजांची फळे भोगणे त्यांना प्राप्त होते. रोमन सत्तेच्या ऱ्हासाची मीमांसा करणारे लठ्ठ लठ्ठ ग्रंथ लिहिण्यात आले आहेत.

गिबनपासून आतापर्यंतच्या साऱ्या इतिहासकारांनी रोमन सत्तेचा ऱ्हास नक्की कोणत्या तारखेस सुरू झाला,हे ठरविण्याची खूप खटपट केली आहे.पण हा प्रश्न अगदी सोपा आहे.त्याचे उत्तर दोनचार वाक्यांत सांगता येण्यासारखे आहे. 


ज्या क्षणी रोम जग जिंकण्यास निघाले,त्याच क्षणी त्याला कीड लागली.त्याच क्षणापासून त्याचा ऱ्हास सुरू झाला.तलवारीवर विसंबल्यामुळे हे तलवारीनेच मेले- तलवारीलाच बळी पडले ! कसे मारावे हे रोमने रानटी लोकांस शिकविले व मग त्याच रानटी लोकांनी उलटून रोमला ठार केले.


कॉन्स्टंटाइनच्या मरणानंतर बरोबर एकशे एकोणचाळीस वर्षांनी म्हणजे इ.स. ४७६ मध्ये रोमचे लष्करी यंत्र हूण,व्हेंडॉल व गॉथ यांच्या हल्ल्यांसमोर कोलमडून पडले ! असीरियन साम्राज्याप्रमाणे रोमन साम्राज्यही स्मृतिशेष झाले ! जगावर सत्ता,गाजवू पाहणारी सारी राष्ट्रे अखेर ज्या गतीला गेली,तीच गती रोमन साम्राज्याचीही झाली.आपल्या महत्त्वाकांक्षेलाच ते बळी पडले.महत्त्वाकांक्षेमुळेच त्याला मरण आले.









१०/५/२५

काळाच्या पुढे पाहणारा लोकराजा / Lokraja who looks ahead of time

 एक जलअभियंता म्हणून मला कायमच हा प्रश्न सतावतो की,जसे सातारा जिल्ह्यामध्ये कोयनेत शिवसागर जलाशय बांधून आपल्या अभियंत्यांनी पोफळीमध्ये जवळपास २००० मेगावॅट एवढ्या प्रचंड क्षमतेचे जलविद्युत केंद्र उभारले.मग महाराष्ट्रात असलेल्या सह्याद्रीच्या इतर डोंगररांगेत पार अगदी रायगड पासून ते खाली सिंधुदुर्गपर्यंत असेच प्रचंड क्षमता असलेले आणखी एक धरण बांधणे शक्य नव्हते का? 


या शक्यतेचा विचार तेव्हाच्या कुशाग्र अभियंत्यांनी केला नसेल का? 


कोणीही या प्लॅनचा विचार केला नसेल का? 


का हे अगदीच अशक्यप्राय होते? 


तर याचे उत्तर 'हो' असेच आहे.मित्रांनो,कोयनेच्या धरणाच्या निर्मितीच्या भरपूर वर्षे आधी वर पडलेल्या शक्यतेचा विचार केला गेला होता. 


आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये राधानगरी, शाहूवाडी,चंदगड,

गगनबावडा,भुदरगड या अगदी सह्याद्रीच्या खांद्यांवर असलेल्या तालुक्यामध्ये कोयनेसारखा भव्य दिव्य प्रकल्प साकारण्यासाठी आवश्यक असलेले सर्व निकष कमी जास्त प्रमाणात आहेतच.

Technically बोलायचं झालं तर अशा भव्य प्रकल्पासाठी आवश्यक असलेला दगड,त्याची रचना,जागा,पाण्याचा कॅचमेंट एरिया,पाऊस आणी सर्वात महत्वाचं 'water हेड' अगदी कोयनेपेक्षा पण जास्त water head आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातील सह्याद्रीच्या रांगांमध्ये आहे. विशेषतःत्यामध्ये राधानगरीचा विचार केला तर ही जागा कोयनेसारख्या भव्य प्रकल्प साकारण्यासाठी योग्य उपलब्ध पर्याय ठरली असती.

कोयनेच्या बऱ्याच आधी राधानगरीत तसाच भव्य वीजप्रकल्प तयार झाला असता.पण प्रश्न फक्त वीजप्रकल्प निर्मितीचा नव्हता तर प्रश्न रयतेचा होता.का ते पाहू चला.


त्यावेळी संस्थान काळात राधानगरीमध्ये बॉक्साइटच्या खाणी मोठ्या प्रमाणात होत्या म्हणून छत्रपती राजाराम महाराजांनी राधानगरी भागात असणाऱ्या बॉक्साइटच्या साठ्यांची पाहणी करण्यासाठी सर डॉ.मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांची नियुक्ती केली होती.सर विश्वेश्वरय्या यांनी अभियांत्रिकी तंञज्ञानाच्या साहाय्याने उद्योग क्षेत्रात कायापालट घडवून आणला होता.यावर सखोल अभ्यास करून विश्वेश्वरय्या सरांनी पूर्ण अहवाल महाराजांना सादर केला.अहवालामध्ये असलेल्या माहिती व सूचनेनुसार बॉक्साइटपासून अल्युमिनियम तयार करण्याचा कारखाना काढता येणे सहज शक्य होते.मग राजाराम महाराजांनी राधानगरी येथे अल्युमिनियमचा मोठा कारखाना काढण्याची योजना आखली व त्यासाठी त्यांनी सुप्रसिद्ध भारतीय उद्योगपती शेठ वालचंद हिराचंद यांच्याकडे ते काम सोपवले. 


शेठ वालचंद यांनी बॉक्साइटपासून अल्युमिनियम निर्मितीच्या कारखान्यासाठी विजेची मोठ्या प्रमाणात गरज भासेल व ही वीज निर्माण करण्यासाठी राधानगरी धरणाचे पाणी फोंडा घाटाखालीपर्यंत नेऊन त्या पाण्याच्या वॉटर हेडचा (पाण्याचा दाब) वापर करून वीजनिर्मिती करून तयार होणाऱ्या विजेचा उपयोग कारखाण्यासाठी करता येईल असे महाराजांना सुचविले. (जसे कोयनेच्या शिवसागर जलाशयाच्या वॉटर हेड चा वापर करून घाटाच्या पायथ्याला पोफळीमध्ये वीजनिर्मिती केली आहे अगदी तसे) त्यासाठी उपलब्ध पाणी कोल्हापूराकडे न सोडता ते खाली फोंडा घाटाच्या पायथ्याशी वीजगृह बांधून सोडायचे.पण त्याचवेळी राधानगरी धरणाचे पाणी हे कोल्हापूर व आसपासच्या भागातील शेतकऱ्यांसाठी उपलब्ध होत असल्याने धरणाचे पाणी वीज निर्मितीसाठी फोंडा घाटाच्या पायथ्याशी वीजगृह तयार करून सोडण्यास राजाराम महाराजांनी नकार दिला.त्याकाळी,आज अस्तित्वात असलेल्या कोयनेपेक्षाही मोठा भव्य वीजनिर्मिती प्रकल्प करणे शक्य असताना व अल्युमिनिअम चा कारखाना पण शक्य असताना फक्त आपला विचार न करता महाराजांनी आपल्या प्रजेचा विचार केला,रयतेच्या कल्याणाचा विचार केला.


 राधानगरीचे धरण बांधण्यासाठी शाहू महाराजांनी आपला संपूर्ण खजिना रिता केला.मनात आणलं असतं तर राजाराम महाराजांनी अल्युमिनिअमचा कारखाना उभारून त्यासाठी आवश्यक असणारी वीज ही राधानगरी धरणाचे पाणी फोंडा घाटाच्या पायथ्याशी वळवून वीजनिर्मिती करून मिळवली देखील असती व आपला सपंलेला खजिना परत मिळवला असता.पण महाराजांनी तसं केलं नाही. त्यांनी उद्योगापेक्षा शेतीला प्राधान्य दिलं.आपल्या रयतेच्या शेतीसाठी प्राधान्य दिलं. 


राजे तेव्हाही म्हणाले होते,"जर आपल्या खजिन्यामुळे शेतकरी सुखी होणार नसेल तर तो खजिना काय कामाचा?" त्यांनंतर राधानगरी धरण पूर्ण झालं आणी सगळा पश्चिम महाराष्ट्र हिरवागार झाला. म्हणूनच खऱ्या अर्थाने रयतेचे राजे असलेल्या राजर्षी शाहू महाराज व राजाराम महाराज यांच्या दूरदृष्टीला माझा कोटी कोटी प्रणाम…


सलाम महाराजांच्या दुर दृष्टीला,खऱ्या अर्थाने रयतेचे राजे - अभिजीत सुनिल वाघमोडे,जलविद्युत अभियंता…


एकदा एक माणूस वाळवंटात हरवला होता.

त्याच्याकडे थोडंसं अन्न आणि पाणी होतं,पण ते लवकरच संपलं.गेले दोन दिवस तो पाण्याच्या एक थेंबासाठीही तळमळत होता.त्याला आतून जाणवू लागलं होतं की जर काही तासांत पाणी मिळालं नाही,तर त्याचा मृत्यू निश्चित आहे.पण तरीही त्याच्यात आशा जिवंत होती आणि तो मनापासून पाण्याच्या शोधात होता.त्याने हार मानली नव्हती.

त्याला विश्वास होता की कुठे ना कुठे पाणी मिळेलच.आणि मग त्याला एका झोपडीसारखी काहीतरी गोष्ट दिसली.

सुरुवातीला त्याला आपल्या डोळ्यांवर विश्वास बसला नाही.


पूर्वीही त्याला मृगजळामुळे फसवणूक झाली होती.पण आता त्याच्याकडे विश्वास ठेवण्याशिवाय पर्याय नव्हता.कारण हीच त्याची शेवटची आशा होती.तो आपली शिल्लक ताकद एकवटून त्या झोपडीकडे चालू लागला. जसजसा तो जवळ गेला,त्याची आशा वाढू लागली. आणि या वेळेस नशीब त्याच्या बाजूने होतं.ती खरंच एक झोपडी होती.पण काय! झोपडी ओस पडलेली होती. असे वाटत होते की खूप वर्षांपासून कोणीही इथे आलेले नव्हते. तरीही पाण्याच्या आशेने तो झोपडीमध्ये गेला.आत गेल्यावर त्याला आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसला नाही.तिथे एक हँडपंप होता! पाण्याच्या प्रत्येक थेंबासाठी तळमळणाऱ्या त्या माणसात नवचैतन्य निर्माण झालं.तो जोरजोरात हँडपंप चालवू लागला.पण हँडपंप कोरडाच निघाला. तो निराश झाला. त्याला वाटलं आता आपला अंत जवळ आला आहे.तो थकून खाली कोसळला.


तेवढ्यात त्याला झोपडीच्या छताला बांधलेली पाण्याची एक बाटली दिसली.कसंबसं करून तो त्या बाटलीजवळ पोहोचला आणि ती उघडून प्यायला लागला,तेवढ्यात त्याला बाटलीवर चिकटवलेला एक कागद दिसला.


त्यावर लिहिलं होतं — "हे पाणी हँडपंप सुरू करण्यासाठी वापरा आणि नंतर बाटली पुन्हा भरून ठेवायला विसरू नका."


ही फारच विचित्र परिस्थिती होती. त्या माणसाला कळत नव्हतं की तो पाणी प्यावं की पंपात ओतावं.


त्याच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले — जर पाणी ओतूनही पंप चालला नाही तर? जर कागदावरील गोष्ट खोटी ठरली तर? जर जमिनीखालचं पाणीही आटलेलं असेल तर? पण जर पंप चालू झाला तर? जर गोष्ट खरी ठरली तर?


थोडा विचार करून त्याने शेवटी नक्की केलं. त्याने बाटली उघडली आणि थरथरत्या हातांनी ते पाणी हँडपंपात ओतलं.


तो हँडपंप चालवू लागला — एक, दोन,तीन वेळा — आणि अचानक पंपातून थंडगार,निर्मळ पाणी बाहेर यायला लागलं.


त्याने भरपूर पाणी प्यायलं.त्याला पुन्हा ऊर्जा मिळाली.त्याचं डोकं काम करायला लागलं.त्याने बाटली पुन्हा भरली आणि ती तशीच छताला बांधून ठेवली.


तेवढ्यात त्याला आणखी एक काचेची बाटली दिसली.त्यात एक पेन्सिल आणि एक नकाशा होता,ज्यात वाळवंटातून बाहेर जाण्याचा मार्ग दर्शवलेला होता.


त्याने तो मार्ग लक्षात ठेवला आणि नकाशावाली बाटली पुन्हा तिथे ठेवली.नंतर त्याने आपल्या इतर बाटल्यांमध्ये पाणी भरलं आणि झोपडीतून बाहेर पडला.थोडं पुढे जाऊन त्याने मागे वळून पाहिलं आणि काहीतरी विचार करून परत झोपडीत गेला. त्याने पाण्याच्या बाटलीवरच्या कागदावर लिहिलं —


"माझ्यावर विश्वास ठेवा, हा हँडपंप खरंच चालतो."


ही गोष्ट आपल्या संपूर्ण आयुष्याबद्दल आहे.ती आपल्याला शिकवते की कितीही वाईट परिस्थिती आली तरी आपली आशा सोडू नये.


या कथेमधून हेही समजतं की काही मोठं मिळवायचं असेल,तर आपल्यालाही आधी काहीतरी द्यावं लागतं — जसं त्या माणसाने अख्खं पाणी हँडपंपात ओतलं.


पाण्याचं या कथेत प्रतीक आहे — अशा गोष्टीचं, ज्या आपल्या आयुष्यात फार महत्त्वाच्या असतात. कुणासाठी ते ज्ञान असू शकतं,कुणासाठी प्रेम,तर कुणासाठी पैसा.हे जे काही आहे,ते मिळवण्यासाठी आधी त्याचं बीज आपल्या कृतींच्या पंपात टाकावं लागतं.आणि त्याच्या बदल्यात आपण त्या गोष्टीचं अनेकपट अधिक मूल्य प्राप्त करतो.


एक व्यक्तीने केलेलं चांगलं कार्य दुसऱ्यापर्यंत, तिसऱ्यापर्यंत पोहोचत जाते,हेही ही गोष्ट आपल्याला शिकवते.


व्हाट्सअप च्या  व नवाविष्कार ग्रुपद्वारे माझ्यापर्यंत आलेली ही गोष्ट आजच्या जगातील हरवत चाललेल़ं ज्ञान पुनश्च हे प्राप्त करा म्हणून सांगत आहे.